{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=438&Itemid=628&limitstart=4", "date_download": "2018-08-18T08:15:58Z", "digest": "sha1:KAWIAY535ITEKWTX6VCVWVNPJF4ABITQ", "length": 9164, "nlines": 44, "source_domain": "saneguruji.net", "title": "गोड निबंध - २", "raw_content": "शनिवार, आँगस्ट 18, 2018\nगोड निबंध - २\n[आगगाडींतून जातांना कांहीं लोकांनी निरनिराळे प्रश्न विचारले. त्यांची मी जी उत्तरें दिलीं तीं खाली देत आहें.]\nप्रश्न :-- सुभाषबाबूंच्या बाबतींत अन्याय झाला असें आपणांस वाटतें का\nउत्तर :-- सुभाषबाबूंच्या बाबतींत जास्तीत जास्त कोणी अन्याय केला असेल तर त्यांना निवडून देणारांनी, सुभाषबाबू विशिष्ट भूमिकेसाठी उभे राहिले होते. ज्यांनी त्यांना निवडून दिलें त्यांनी हें ध्यानांत धरिलें पाहिजे होते. परंतु पट्टाभींचा पराजय तो माझा पराजय असें महात्माजींनी जाहीर करतांच सुभाषांना निवडून देणारे गारठले. ते म्हणाले, 'आम्हांला ही नव्हती गोष्ट माहीत. पट्टाभींपेक्षा सुभाष बरे असें आम्हांला वाटलें. परंतु सुभाष बरें म्हणजे महात्माजी जाणें असा अर्थ होत असेल तर आम्हांला पुन्हां पाऊल सुधारलें पाहिजे.' जहाल गटांतील लोक पंतांच्या ठरावावर मूग गिळून बसलें. सुभाषचंद्र उघडे पडलें. महात्माजींना काय बोल त्यांची भूमिका स्पष्ट होती.\nप्रश्न :-- महात्माजींनी सुभाष निवडून आले तर तो मी माझा पराजय समजेन, असें आधी कां जाहीर केलें नाही\nउत्तर :-- महात्माजींच्या वजनामुळें सुभाष निवडून आले नाहींत असे लोक म्हणतील.\nप्रश्न :-- पूर्वीचे प्रश्न जावोत. परन्तु कलकत्त्यास प्रकार झाले ते बरे का\nउत्तर :-- मला व्यक्तिश: असें वाटतें कीं, वर्किंग कमिटींत नवीन लोक घेतले असते तर चांगलें झालें असतें. त्यालाच सहकार्य म्हणतात. नव्या वृत्तीचे कांही सभासद असले तर कांहीं मोठा उत्पात झाला नसता. सुभाष बाबूंनी मागणी कमी कमी करीत आणली. परन्तु गांधीवादी मंडळींनीं तडजोड केली नाहीं. पूर्वीची व. कमिटी संपूर्णपणे एकदा सुभाषबाबूंनी मंजूर करावी, मग वाटलें तर एकदोन जागा आम्ही खाली करूं असे त्यांचे म्हणणें. यांत सुभाषबाबूंचा संपूर्ण स्वाभिमान धुळींत मिळविणें ही एकच गोष्ट होती. सुभाषबाबूंनी राजीनामा दिला. जें पाहिजे होतें तें झालें. एकीकडे राष्ट्रांत ऐक्य पाहिजे असा कंठशोष केला जात आहे तर इकडे थोडीहि देवाण घेवाण न करण्याचें व्रत सहकार्यासाठी सर्वांना तहान हवी.\nप्रश्न :-- महात्मा गांधी पत्रव्यवहारांत लिहितात कीं, पंतांचा ठराव मला अलाहाबादेस येईपर्यंत माहीत नव्हता. ही गोष्ट खरी का\nउत्तर :-- महात्माजींवर मी असत्याचा आरोप कसा करूं जीवनांत संपूर्णपणे सत्य यावें म्हणून ज्यांना तळमळ, त्यांचा शब्द मी प्रमाण मानतो.\nप्रश्न :-- त्रिपुरीस हा ठराव महात्माजींस पसंत आहे अशा कंडया पसरविल्या जात त्यांचे काय\nउत्तर :-- महात्माजींच्या नांवावर कोणी असें म्हटलें तर त्याचा दोष महात्माजींवर नाहीं. राजगोपालाचारी वगैरे तेथें म्हणालेच होते कीं, हा ठराव महात्माजींना आवडेल की नाही हें आम्हांस पहावयाचे नाही. आम्हाला महात्माजी पाहिजे आहेत व म्हणून हा ठराव.\nप्रश्न :-- महात्माजी पत्रव्यवहारांत म्हणतात, 'हा ठराव जों जों मी वाचतों, तों तों मला तो अधिक अप्रिय वाटतो.' महात्माजींना ठराव अप्रिय असेल तर त्यांचे अनुयायी तो मागें कां घेत नाहीत\nउत्तर :-- ते म्हणतील महात्माजींच्या पसंती-नापसंतीचा हा प्रश्न नाही. हा राष्ट्रांतील सभासदांच्या स्वेच्छेचा प्रश्न आहे. महात्माजींचे अनुयायी त्यांचे आंधळे भक्त नाहींत हेंहि यावरून सिध्द होईल.\nप्रश्न :-- अहिंसा, सत्य जर सुभाषचंद्रहि मानतात तर मग विरोध का\nउत्तर :-- विरोध कोठें आहे ती गोष्ट स्पष्ट झाली नाही. १९३३-३४ साली जेव्हां सत्याग्रह थांबविण्यांत आला, तेव्हा युरोपांतून स्वर्गीय विठ्ठलभाई पटेल व सुभाषबाबू यांनी एक पत्रक काढलें होतें. त्यांत त्यांनी म्हटले होतें, 'सत्य, अहिंसा हीं सनातन तत्त्वें राजकारणांत आणणें योग्य नव्हें. आजचे पुढारीपण दूर केलें पाहिजे.' पूर्वीच्या अशा पत्रकांमुळे सुभाषबाबूंवर विश्वास बसत नसेल. परंतु सुभाषबाबू आज सांगतात तर त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला पाहिजे. परंतु सत्य व अहिंसा मानूनही कार्यक्रमांत फेर असेल.\nगोड निबंध - भाग २\nगोड निबंध - भाग २\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/when-a-dear-one/", "date_download": "2018-08-18T09:15:51Z", "digest": "sha1:GF3RFEWLIF7PT25IWSI47NIATK46IABH", "length": 5636, "nlines": 139, "source_domain": "www.marathimati.net", "title": "जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तिची | When A Dear One", "raw_content": "\nजेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तिची\nजेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तिची मृत्यु होते तेव्हा आपल्याला दुःख वाटणे साहजिक आहे. पण रडून शोक व्यक्त करण्यापेक्षा आपण हा ही विचार केला पाहिजे की ती व्यक्ती या संसाराच्या गजबजलेल्या चक्रातून थोड्या काळासाठी का होईना मुक्त झालेली आहे.\nया वर्गातील आणखी काही लेख\nलोभ सोडलेला खरा सुखी\nपरमेश्वरच सगळे करवून घेतो\nThis entry was posted in सुविचार and tagged दुःख, मृत्यु, व्यक्ती, शोक, सुविचार on जुन 21, 2011 by विराज काटदरे.\n← कुठल्याही वासनेचा घोडा आणि सांबर →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/250/Maghamas-Padali-Thandi.php", "date_download": "2018-08-18T08:37:58Z", "digest": "sha1:P4FP5555CFFMGGJIXS2STUM4CJS5ZN7M", "length": 11091, "nlines": 152, "source_domain": "www.gadima.com", "title": "Maghamas Padali Thandi -: माघ मास पडली थंडी : Lavnya (Ga.Di.Madgulkar|Asha Bhosle|Sudhir Phadke) | Marathi Song", "raw_content": "\nनदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर,\nअशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर.\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nमाघ मास पडली थंडी\nचित्रपट: झाला महार पंढरीनाथ Film: Zala Mahar Pandharinath\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nमाघ मास पडली थंडी, पती माझे गेले गावा\nमुक्कामाला र्‍हावा, पाव्हणं मुक्कामाला र्‍हावा\nमजल फार पडली तुम्हा, जरा ओसरीला टेका\nगरम तापवीते हंडा, हातपाय थोडे शेका\nलिंबोणीला बांधा घोडा, चारा-पाणी त्याला दावा\nमुक्कामाला र्‍हावा, पाव्हणं मुक्कामाला र्‍हावा\nदूर वावराची वस्ती, गाव लांब तिकडं राही\nतिन्हीसांज टळुनी गेली, येत-जात कुणी नाही\nचार घास माझ्या हातचे ऊन ऊन तुम्ही जेवा\nमुक्कामाला र्‍हावा, पाव्हणं मुक्कामाला र्‍हावा\nसकाळीच न्हाले होते अजून केस ओले ओले\nआवतन्यावाचून तुमचे पाय कसे दारी आले\nउर्स बघायासी गेल्या सासुबाई-नणंदा-जावा\nमुक्कामाला र्‍हावा, पाव्हणं मुक्कामाला र्‍हावा\nगीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते तेच छंदासह....\nमाय माझी हंसावर बैसली\nपदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा\nसाडी दिली शंभर रुपयांची\nतुझ्या ऊसाला लागल कोल्हा\nयेणे जाणे का हो सोडले\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2018-08-18T07:59:10Z", "digest": "sha1:5JXVVQA46UHR4DAFXBDOG57TCAJDRBZ3", "length": 6007, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आवक जास्त झाल्याने फुलांच्या भावात घसरण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआवक जास्त झाल्याने फुलांच्या भावात घसरण\nपुणे – मार्केट यार्डातील फुल बाजरात फुलांना आवकच्या तुलनेत मागणी कमी आहे. त्यामुळे गुलछडी वगळता सर्व प्रकारच्या फुलांच्या भावात सुमारे 20 ते 30 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. गुलछडीच्या भावात मात्र सुमारे 25 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. आजपासूनच (रविवार) श्रावण महिना सुरू झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात फुलांना मागणी वाढेल, असा अंदाज व्यापारी सागर भोसले यांनी वर्तविला आहे.\nसध्या जिल्ह्यात फुलांच्या उत्पादनासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे बाजारात जास्त माल येत आहे. येत्या काही दिवसातच फुलांच्या किंमती वाढलीत. शेतकऱ्यांना जास्त भाव मिळेल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.\nफुलांचे प्रतिकिलोचे भाव : झेंडू : 5-20, गुलछडी : 110150, कापरी : 10-20, शेवंती 50-80, ऑस्टर : 15-25, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : 15-25, गुलछडी काडी : 10-40, डच गुलाब (20 नग) : 50-70, लिलिबंडल : 12-18, जर्बेरा : 20-40, कार्नेशियन : 50-100, जुई 200-300.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसोशल मिडीयावर व्हिडीओ क्लिप व्हायरल करणाऱ्यांविरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल\nNext articleसंविधान जाळल्याच्या घटनेचा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B3%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82/", "date_download": "2018-08-18T07:59:08Z", "digest": "sha1:NCVHUCFCD3YTFJBTEPSDBL44OWUSM2BB", "length": 10826, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तामीळनाडूचे माजी मुख्यमंत्री करूणानिधी यांचे निधन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतामीळनाडूचे माजी मुख्यमंत्री करूणानिधी यांचे निधन\nचेन्नई – तामीळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख एम.करूणानिधी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. काही महिन्यांपूर्वी माजी मुख्यमंत्री जयललिता आणि आता करूणानिधी यांच्या जाण्याने दोन्ही प्रमुख ध्रुव निखळल्याने त्या राज्याच्या राजकीय अवकाशात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान, करूणानिधी यांच्या निधनाबद्दल तामीळनाडू सरकारने सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.\nप्रकृती खालावल्याने करूणानिधी यांना मागील अकरा दिवसांपासून येथील खासगी कावेरी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच सायंकाळी 6 वाजूून 10 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. करूणानिधी यांना दाखल करण्यात आल्यापासून रूग्णालयाच्या आवारात त्यांच्या समर्थकांची आणि द्रमुकच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होत होती. त्यांची प्रकृती आणखी खालावल्याचे वृत्त आज पसरल्यानंतर समर्थकांचे लोंढेच रूग्णालयाच्या आवारात जमा झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने दु:ख अनावर होऊन अनेकांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली. करूणानिधी यांच्यामागे दोन पत्नी आणि सहा मुलगे असा परिवार आहे. द्रमुकचे कार्याध्यक्ष एम.के.स्टॅलिन हे पुत्र आणि खासदार कनिमोळी या कन्या त्यांचे राजकीय वारसदार आहेत.\nतामीळनाडूच्या राजकारणातील करिष्माई नेतृत्वापैकी एक म्हणून करूणानिधी यांच्याकडे नेहमीच पाहिले गेले. त्यांच्या रूपाने द्रविड चळवळीतील एक भक्कम खांब निखळला. तब्बल सात दशके सार्वजनिक जीवनात सक्रिय राहिलेल्या करूणानिधी यांनी कलाकार आणि नेता म्हणून स्वत:चा ठसा उमटवला. कला आणि राजकीय क्षेत्रांत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना कलैग्नार (कलाकार) आणि थलैवा (नेता) या उपाध्या मिळाल्या.\nकरूणानिधी यांचा राजकारणातील प्रवास थक्क करणारा ठरला. त्यांनी 1969 मध्ये स्वीकारलेले द्रमुकचे अध्यक्षपद अखेरच्या श्‍वासापर्यंत सांभाळले. तामीळनाडू विधानसभेवर ते 13 वेळा निवडून गेले. सर्वांत अखेरीस 92 व्या वर्षी ते विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यांनी पाचवेळा तामीळनाडूचे मुख्यमंत्रिपद भुषवले. दिवंगत सी.एन.अण्णादुराई यांच्या निधनानंतर 1969 मध्ये ते सर्वप्रथम मुख्यमंत्री बनले. त्या राज्याची सत्ता प्रदीर्घ काळ जयललिता आणि करूणानिधी यांच्याभोवतीच फिरत राहिली.\nआता त्या दोघांच्याही निधनाने तामीळनाडूतील जनतेला नवे नेतृत्व शोधावे लागणार आहे. दिल्लीच्या दरबारातही करूणानिधी यांनी स्वत:चे महत्व अबाधित ठेवले. त्यासाठी राष्ट्रीय राजकारणातील एकमेकांचे प्रमुख प्रतिस्पर्धी असणाऱ्या कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांशी प्रसंग पाहून हातमिळवणी करण्याची राजकीय चलाखीही त्यांनी दाखवली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराष्ट्रीयकृत बॅकांमधील रिक्त जागा भरणार\nNext articleतीन वर्षांतील घोटाळ्यांमुळे बॅंकांना 70 हजार कोटी रूपयांचा फटका\n“प्रत्येकाच्या मनात सद्भावना असल्यास देशात सहिष्णुता नांदेल’\nनिम्म्या कर्नाटकवर दुष्काळाचे सावट; मात्र काही भागांत पूरस्थिती\nकाश्‍मीरमधील ग्रेनेड हल्ल्यात एकाचा मृत्यूू, तिघे जखमी\nछत्तीसगडमध्ये भिंत कोसळून तीन ठार\nसात दिवस केरळमध्ये फोन कॉल आणि मोबाईल डाटा वापर विनामुल्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A4%BE_%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B0%E0%A5%80,_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-08-18T09:00:44Z", "digest": "sha1:FGMQWSMHXEWF6LMBEUW7IIWVHU4G6UN3", "length": 4763, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चौथा हेन्‍री, फ्रान्स - विकिपीडिया", "raw_content": "\n२ ऑगस्ट १५८९ – १४ मे १६१०\n१४ मे १६१० (वयः ४१)\nचौथा हेन्‍री (१३ डिसेंबर १५५३ - १४ मे १६१०) हा इ.स. १५८९ ते इ.स. १६१० दरम्यान फ्रान्सचा राजा होता.\nइ.स. १५५३ मधील जन्म\nइ.स. १६१० मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ रोजी ०१:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/garodarpanat-lohachya-sevanat-yenare-adathale", "date_download": "2018-08-18T08:21:43Z", "digest": "sha1:KUFQSV26WGR47UFUONC53S72CEPVIZX4", "length": 15462, "nlines": 225, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गरोदरपणात लोहाच्या सेवनात येणारे अडथळे - Tinystep", "raw_content": "\nगरोदरपणात लोहाच्या सेवनात येणारे अडथळे\nगर्भवती झाल्यावर स्त्रियांच्या आयुष्यात खूप बदल घडतात. या सर्व शारीरिक आणि संप्रेरक बदलांमुळे तुमच्या शरीराला लागणारी उर्जा आणि जीवनसत्वांची गरज सुद्धा वाढते. ही गरज पूर्ण होत आहे की नाही हे पाहण्यासाठी तुमच्या आहारावर कडक नजर ठेवा, खास करून तुमच्या जीवनसत्वांच्या सेवनावर. काही महत्वाच्या गोष्टी पाळणे या काळात गरजेचे असते.\nगरोदरपणात उर्जेची गरज का भासते\nआहाराच्या बाबतीत म्हणायचे झाले तर गरोदरपणात सगळ्यात जास्त उर्जेची गरज ही लोहाद्वारे भागवली जाते. आहारात लोहाचे प्रमाण असणे कोणत्याही स्त्री साठी अतिशय आवश्यक असते. मासिक पाळीतील रक्तस्त्रावामुळे नियमितपणे तुमच्या शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होत असते आणि शरीराला लोहाची गरज भासते. हिमोग्लोबिन हे रक्तामध्ये लोह मिसळण्यासाठी मधल्या दुव्याचे काम करते. म्हणजेच लाल पेशींच्या अभिसरणाचे काम हिमोग्लोबिनमुळे जलद होते. म्हणूनच शरीरात लोहाचे प्रमाण योग्य असणे हे प्रत्येक स्त्री साठी अतिशय महत्वाचे आहे.\nगरोदर असताना तर शरीरात असणारे लोह गर्भवतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावते. पुरेश्या प्रमाणात लोहयुक्त पदार्थांचे सेवन न करणे हे बाळाचा जीव धोक्यात घालण्याबरोबर आहे. तुमच्या माहितीसाठी सांगायचे तर, लोहाची कमतरता भ्रूणाच्या अपूर्ण वाढीसाठी कारणीभूत असते. बाळाच्या मेंदू विकासासाठी पुरेश्या प्रमाणात लोह मिळणे गरजेचे आहे, म्हणून ते इतके महत्वाचे ठरते. लोह कमी पडल्यास त्याचे परिणाम बाळाच्या वाढीवर दिसू शकतात जसे, उशिरा बोलणे, नैराश्य, थकवा इ. त्यामुळे शरीरातील लोह्प्रमाण ही दुर्लक्ष करण्यासारखी बाब नक्कीच नाहीये.\nलोहाची कमतरता अजून एका प्रकारासाठी ठरते तो म्हणजे ‘अनेमिया’. यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी घटते आणि त्याचे गर्भधारणेवर धोकादायक परिणाम उदभवू शकतात, जसे, मुदतपूर्व प्रसूती कळा, भृणाचा मृत्यू किंवा कमी वजनाच्या बाळाचा जन्म होणे. या कारणामुळे जन्म देणाऱ्या मातेच्या जीवासही धोका उद्भवतो.\nगरोदरपणात आणि गरोदर नसतानाही स्त्रियांसाठी लोहाचे योग्य प्रमाण आहारात असणे किती गरजेचे आहे ते आपण पहिले.\nआता पाहूयात की, या लोहाला रक्तात शोषून घेण्यासाठी कोणते अडथळे येतात. मानवी शरीरात काही ठराविक पोषकत्वे आणि रासायनिक घटक असतात जे लोहाचे आपल्या शरीरावरील परिणाम घडू देत नाहीत, म्हणून त्यांचे प्रकार जाणून घेणे महत्वाचे ठरते जेणेकरून भविष्यात ते आपल्याला टाळता येतील.\nकॅल्शियम हिम(heme) आणि नॉन-हिम (non-heme) (उर्जेसाठी आवश्यक असणारी प्रथिने) अशा दोन्ही प्रकारच्या लोहाच्या शोषणात अडथळे निर्माण करते. तुम्ही दुध, चीज ,सोयाबीन, ब्रोकोली इ. पदार्थांचे सेवन टाळायला हवे. जरी कॅल्शियम तुमच्या हाडांच्या वाढीसाठी आवश्यक असले, तरीही दोन्हीचे आहारातील प्रमाण योग्य असायला हवे. बाळाच्या योग्य वाढीसाठी तुमच्या आहारावर बारीक लक्ष ठेवा.\nज्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅफेन आढळते म्हणजेच हवाबंद पेय, कॉफी इत्यादी पदार्थ या काळात टाळा. कॅफेन मध्ये उपस्थित असणारे घटक लोह रक्तात शोषून घेण्यास अडथळा निर्माण करतात, आणि शरीर कमजोर होते. असे आढळून आले आहे कि ज्या महिला कॅफेनचे गरजेपेक्षा जास्त सेवन करतात त्यांच्या बाबतीत गर्भ पाडणे, मृत बाळाचा जन्म, आणि तिसऱ्या त्रैमासिकात अथवा त्या आधी गर्भपात याचे प्रमाण जास्त आहे. अशावेळी अपुर्ण वाढ झालेले बाळ किंवा कमी वजनाचे बाळ देखील जन्म घेऊ शकते. तेंव्हा जर तुम्हाला कॉफीची सवय असेल आणि तुम्ही आई होणार आहात तर आमचा सल्ला आहे की ‘’कॉफी आजच थांबवा”.\n३) पोलीफेनोल आणि फेनोलिक आम्ल आढळून येणारे पदार्थ\nही दोन्ही रसायने तुमच्या शरीरात लोह शोषण प्रक्रियेत अडथळा निर्माण करतात, म्हणून हे दोन घटक उपस्थित असणाऱ्या पदार्थांपासून दूरच रहा. यामध्ये डार्क चोकलेट (कोको मध्ये पोलीफेनोल्स चे प्रमाण अधिक असते.), डोंगरी बदाम (हेझल नट्स), स्ट्रॉबेरी आणि सोया दही यांचा समावेश होतो.\nअजून एक घटक जे लोहशोषणात अडथळा निर्माण करतात ते म्हणजे फायटेटस् किंवा फायटीक आम्ल. संपूर्ण गहू, बटाटे आणि काजू यांमध्ये हा घटक प्रामुख्याने आढळतो.‘जीवनसत्व सी’ चे भरपूर सेवन करा जे फायटिक आम्लाचा परिणाम नष्ट करते व लोह रक्तात शोषले जाते. याबरोबरच, अब्सोर्बिक आम्ल जास्त असणार्‍या पदार्थांचे सेवन करा, यातील घटक शरीराला लोह शोषून घेण्यास सगळ्यात जास्त मदत करतात. जसे, मासे, मांस, संत्री, हिरव्या भाज्या यांमध्ये अब्सोर्बिक आम्ल आढळते. या पदार्थांचा आहारात समावेश करून घ्या.काळजी घ्या.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%98/", "date_download": "2018-08-18T07:59:22Z", "digest": "sha1:TWUOBFYQKJMNU7RTZYPEHIWJHVZUIVZP", "length": 9729, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तरुणी का त्रस्त आहेत गुडघ्याच्या आर्थरायटिसने? (भाग २) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतरुणी का त्रस्त आहेत गुडघ्याच्या आर्थरायटिसने\nतरुणी का त्रस्त आहेत गुडघ्याच्या आर्थरायटिसने\nगुडघ्यांच्या ऑस्टिओ आर्थरायटिसला प्रतिबंध करू शकतो का\nवाढत्या वयानुसार गुडघ्यांचा थोडाफार ऱ्हास होणारच. केस पांढरे होणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे याप्रमाणेच गुडघ्यांमधील कास्थी पातळ होत जातात. सकस आहार आणि नियमित व्यायामाने आपण आपले वजन नियंत्रणात ठेवू शकतो आणि कास्थींचा ऱ्हास होणे काही प्रमाणात थांबवू शकतो. मधुमेहासारख्या वैद्यकीय समस्यांना दूर ठेवूनही ऑस्टिओ आर्थरायटिसला प्रतिबंध करता येऊ शकतो. आधुनिक वैद्यकशास्त्राने गुडघे प्रत्यारोपणाचा शोध लावत ऑस्टिओ आर्थरायटिसवर उपचार शोधले आहेत, पण ऑस्टिओ आर्थरायटिसचा प्रतिबंध करणे हा पुढील मोठा शोध असणार आहे. स्टेम सेलच्या क्षेत्रात चाललेल्या संशोधनामुळे येत्या काही दशकांमध्ये कास्थींचा ऱ्हास रोखण्यासाठी काही उपायांचा शोध लागू शकेल.\nपरंतु, ज्या महिलेला तरुण वयातच या आजाराच्या चौथ्या टप्प्याने गाठले आहे, त्या महिलेवर संपूर्ण गुडघे प्रत्यारोपण हा काही सर्वात योग्य पर्याय असू शकत नाही रुग्णाचे वय कितीही असले तरी संपूर्ण गुडघे प्रत्यारोपण हा नेहमीच शेवटचा उपाय असतो. माझ्याकडे अनेक रुग्ण येतात, त्यांच्या गुडघ्याचा एक्‍स-रे दाखवतात आणि त्यांना गुडघे प्रत्यारोपणाची आवश्‍यकता आहे का, अशी विचारणा करतात. मी त्यांना सांगतो, केवळ एक्‍स-रे पाहून गुडघे प्रत्यारोपण करायचे की नाही ते ठरवता येत नाही. त्यांना वेदना किती प्रमाणात होत आहे, त्यांना नीट चालता येत नसल्यामुळे त्यांच्या राहणीमानावर किती परिणाम झाला आहे, या घटकांचाही विचार करण्यात येतो. स्नायू बळकट करणारा व्यायाम (फिजिओथेरपी) आणि जॉइंट सप्लिमेंट्‌स या उपचारांचा प्रथम विचार करण्यात येतो. त्यानंतर व्हिस्कोसप्लिमेंटेशन इंजेक्‍शन देण्यात येतात. ज्या रुग्णांवर या उपचारांचा परिणाम होत नाही. त्यांच्यावर गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा विचार केला जातो.\nसंपूर्ण गुडघे प्रत्यारोपणाची आयुर्मर्यादा वाढल्यामुळे तरुण महिलांनाही संपूर्ण गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करवून घेण्याचा सल्ला देण्यात येतो. ज्या तरुण महिलांच्या गुडघ्यातील कास्थींचा एका बाजूला ऱ्हास झाला आहे, त्यांना अंशत: गुडघे प्रत्यारोपण करण्याचा सल्ला देण्यात येतो. या प्रकाराला युनिकॉन्डिलर नी रिप्लेसमेंट असे म्हणतात. या शस्त्रक्रियेनंतर रिकव्हरी वेगाने होते आणि कोणत्याही बंधनाशिवाय तरुण महिला आपली दैनंदिन कामे करू शकतात. वयोगट कोणताही असू दे, जर गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया योग्य रुग्णांवर केली तर त्यांना बराच काळ वेदनारहित आयुष्य जगता येईल.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा\nNext articleट्रक ट्रेलर आणि टायर परिसंवादाला प्रतिसाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/nanar-project-anti-chamber-shivsena-minister-111987", "date_download": "2018-08-18T08:37:01Z", "digest": "sha1:BHF5GEKXVR7DEHCFHHMAE7ZJH2W5PUBY", "length": 13937, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "nanar project anti chamber shivsena minister 'अँटी चेंबर' वार्तालापाने शिवसेना मंत्री शांत | eSakal", "raw_content": "\n'अँटी चेंबर' वार्तालापाने शिवसेना मंत्री शांत\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nमुंबई - बहुचर्चित नाणार प्रकल्प रद्द करण्याच्या घोषणेनंतर आज मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना मंत्र्यांनी मात्र मिठाची गुळणी धरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या पाच मंत्र्यासोबत अँटी चेंबरमध्ये वार्तालाप करत विरोधाची धार कमी करण्यात यश मिळवले.\nमुंबई - बहुचर्चित नाणार प्रकल्प रद्द करण्याच्या घोषणेनंतर आज मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना मंत्र्यांनी मात्र मिठाची गुळणी धरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या पाच मंत्र्यासोबत अँटी चेंबरमध्ये वार्तालाप करत विरोधाची धार कमी करण्यात यश मिळवले.\nशिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणारच्या सभेत प्रकल्पाला कठोर विरोध केल्यानंतर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेना मंत्री कोणता पवित्रा घेतात, याची उत्सुकता लागली होती. मात्र, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी, नाणार प्रकल्प रद्द करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या सचिवांना देण्यात आले असून त्याबाबतची अधिसूचना रद्द करणारी प्रक्रिया सुरू करण्याचे सांगितल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली.\nमंत्रिमंडळ बैठकीच्या अगोदर शिवसेनेच्या पाच मंत्र्यांनी थेट बैठकीत न जाता मुख्यमंत्री दालनातील अँटी चेंबरमध्ये जाणे पसंत केले. इकडे भाजपच्या मंत्र्यासोबत मंत्रिमंडळ बैठक सुरू झाली होती. शिवसेना मंत्र्यांनी बैठकीवर बहिष्कार घातला की काय, अशी शंका भाजपच्या मंत्र्यांनी व्यक्‍त केली. मात्र, पहिल्या निर्णयावर चर्चा सुरू असताना अचानक मुख्यमंत्र्यांनी बैठक थांबवली व ते अँटी चेंबरमध्ये गेले. तेथे शिवसेना मंत्र्याशी त्यांनी नाणारबाबत चर्चा केल्याचे समजते. मी त्यांना नाणारची अधिसूचना रद्द करण्याबाबतचे पत्र दिल्याची माहिती स्वत: देसाई यांनी दिली. मात्र, दहा ते पंधरा मिनिटांच्या चर्चेनंतर शिवसेनचे मंत्री बैठकीला हजर झाले. अँटी चेंबरमध्ये नेमकी काय चर्चा झाली, मुख्यमंत्र्याची नेमकी भूमिका काय, याबाबत मात्र अधिकृत माहिती मिळाली नाही.\nप्रक्रिया सुरू - सुभाष देसाई\nनाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचा दावा सुभाष देसाई यांनी केला. उद्योग विभागाच्या सचिवांना त्याबाबतचे आदेश दिल्याचे ते म्हणाले. अधिसूचना काढण्याचा अधिकार उद्योग मंत्र्याकडे असेल तर तो रद्द करण्याचाही अधिकार \"एमआयडीसी'च्या नियमानुसार उद्योगमंत्र्यांनाच असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनाही यासाठीचे पत्र दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nबारामती - विद्या प्रतिष्ठानच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पुरस्कार\nबारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nउंड्री - पाचव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजूर ठार\nउंड्री - गुलाम अली नगर गल्ली नं 6 दि.13 ऑगस्ट दु.12.30 वाजता एका निर्माणाधीन इमारतीचे काम सुरू असताना पाचव्या मजल्यावर पडून राजशेखर माशाले (वय 33...\nपिंपळवंडीला मानव-बिबट सहजीवन जनजागृती\nजुन्नर - पिंपळवंडी ता.जुन्नर येथे मानव व बिबट संघर्ष व सहजीवन याविषयी मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती करण्यात आली. जुन्नर वन विभाग तसेच...\nदूध भुकटी उद्योग संकटात ; शेतकऱ्यांना वाढीव दराची प्रतीक्षाच\nसोलापूर : दूध व दुग्धजन्य पदार्थांची देशांतर्गत गरज भागवून शिल्लक दुधापासून भुकटी बनविली जाते. परंतु, सद्यःस्थितीत महाराष्ट्रात 30 हजार टन तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/rent-thirty-thousand-repair-cost-ninety-thousand-404835-2/", "date_download": "2018-08-18T07:59:21Z", "digest": "sha1:5VDKB5RH7LXYOMHFWDSNPCBQH7H37RID", "length": 14873, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भाडे तीस हजार……… दुरूस्तीचा खर्च नव्वद हजार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभाडे तीस हजार……… दुरूस्तीचा खर्च नव्वद हजार\nसाशाच्या बेजबाबदारपणामुळे कॉम्पॅक्‍टरच्या हायड्रोलिकचे वाटोळे\nसातारा- सातत्याने वादग्रस्त कारभारामुळे चर्चेत असलेल्या आणि सातारा शहराच्या स्वच्छतेची धुरा वाहणाऱ्या ठेकेदार साशा कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे सातारा पालिकेच्या कॉम्पॅक्‍टरचे वाटोळे झाले आहे. कंपनीकडे कुशल चालक नसल्याने कॉम्पॅक्‍टरची हायड्रोलिक सिस्टिम खराब झाली असून त्यामुळे पालिकेला तब्बल नव्वद हजार रूपये खर्चाचा भार पडला आहे. सातारा परिवहन विभागाचे कुशल चालक हे बाजूलाच राहिल्याने पालिकेने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. कॉम्पॅक्‍टरचे भाडे मिळणार तीस हजार आणि खर्च नव्वद हजार त्यामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर असा तुगलकी कारभार यानिमित्ताने पाहावयास मिळाला आहे.\nआरोग्य सभापती यदुनाथ नारकर यांनी तातडीने लक्ष घालून हा प्रश्‍न सोडवावा अशी सातारकरांना अपेक्षा आहे. सातारा शहराचे प्रतिनिधित्व करणारे सातारा नगरपालिका आणि तिची महसूल वृध्दी हा नेहमीच वादाचा विषय ठरला आहे. नगरसेवकांच्या टक्‍केवारीच्या लाथाळ्यात कोणालाच रचनात्मक कार्य करण्याची इच्छा होईनाशी झाली आहे. सातारा पालिकेचे नगरसेवक हे मलिदा बहाद्दर आहेत. असा आरोप होऊ लागला असून त्याला खतपाणी घालणाऱ्या घटना वारंवार समोर येत आहेत.\nसातारा पालिकेचा कॉम्पॅक्‍टर गेल्या चार दिवसापासून परिवहन विभागात हायड्रोलिक यंत्रणेच्या बिघाडामुळे उभा असून सातारा पालिकेला सातारा शहरातील कचरा उचलण्यासाठी खाजगी ट्रॅक्‍टर भाड्याने लावण्याची वेळ आली आहे. स्वच्छता सर्वेक्षण अभियानामध्ये कचरा कुंडी मुक्‍त शहराला विशेष मार्क आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपला कचरा घंटागाडीतच टाकावा या करीता आरोग्य विभागाचे विशेष प्रयत्न चालू आहेत. मात्र या कामांना साशा कंपनीच्या चुकीच्या धोरणांमुळे ब्रेक लागला आहे. कॉम्पॅक्‍टर चालवण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाची विशेष परवाना असणारे चालक असावे लागतात. ते चालक साशा कंपनीकडे नसल्यामुळे कॉम्पॅक्‍टरच्या हायड्रोलिक सिस्टिमची दुरावस्था झाली आहे. खऱ्या अर्थाने ज्या वेळी कॉम्पॅक्‍टरची गरज आहे, त्यावेळी बिघडलेला कॉम्पॅक्‍टर तब्बल चार दिवस परिवहन विभागात उभा करण्याची वेळ आली आहे.\nचुकीच्या गिअर ऑपरेटिंगमुळे हायड्रोलिक बारवर ताण\nइ.स. 2012 मध्ये सातारा पालिकेने 13 लाख रूपये खर्चुन स्वंतत्र चासी आणि त्यावर हायड्रोलिक सिस्टिम असा कॉम्पॅक्‍टर डिझाईन केला होता. त्यावेळी बाराव्या वित्त आयोगातून पालिकेने पाठपुरावा करून सातारकरांसाठी ही सुविधा उपलब्ध केली होती. सातारा शहरात जमा होणाऱ्या चाळीस टन कचऱ्यापैकी 11 टन कचरा हा कंटेनरमध्ये जमा होत होता. हे कंटेनर उचलून सोनगावच्या कचरा डेपोत रिकामे करणे आणि पुन्हा शहरात ठिकठिकाणी त्यांना आणून ठेवणे ही परिवहन विभागाची जबाबदारी होती. पालिकेकडे असताना कॉम्पॅक्‍टरच्या हायड्रोलिक सिस्टिमने कधीच त्रास दिला नाही, मात्र जसा हा कॉम्पॅक्‍टर साशा कंपनीकडे 30 हजार रूपये महिना भाड्याने गेला तसा त्याच्या कुरबूरी चालू झाल्या. साशा कंपनीचे चालक या कॉम्पॅक्‍टरसाठी प्रशिक्षित नसल्याने कॉम्पॅक्‍टरच्या हायड्रोलिक सिस्टिमचा घोळ झाला आहे.\nकंटेनर उचलण्यापासून ते कॉम्पॅटरमध्ये घेईपर्यंत पाच गिअर वापरावे लागतात. हे गिअर वापरताना विशिष्ट प्रणालीचा अंमलात आणावी लागते. मात्र साशाच्या चालकांकडून ही ऑपरेटिंग सिस्टिम धरसोड पध्दतीने होत असल्याने कॉम्पॅक्‍टरच्या हायड्रोलिक बारला दणका बसून पुलिंग सिस्टिम खराब झाल्याची माहिती आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.\nतांत्रिक बिघाड की आर्थिक सोय\nदेखभाल दुरूस्ती हा शब्द सातारा पालिकेत सोयिस्कर लाभासाठी वापरला जातो. ठेकेदार आणि नगरसेवक यांच्यातील मधुर संबंधाचा हा परवलीचा शब्द नगराध्यक्षांच्या दालनात आरोग्य सभापती यदुनाथ नारकर यांचा जो सात्विक संताप झाला, त्याला बरेच राजकीय संदर्भ होते. मात्र आरोग्य विभागाच्या कारभारावर सतत संशयाचे ढग जमा होत असतात. कॉम्पॅक्‍टर जर चार चार दिवस दुरूस्त न होता उभा राहत असेल आणि खाजगी ट्रॅक्‍टरला भाड्याने कचरा उचलण्याच्या कामाला लावले जात असेल तर तांत्रिक बिघाड की आर्थिक सोय अशी दुहेरी चर्चा पालिकेत ऐकायला मिळत आहे. घंटागाडी आणि ट्रॅक्‍टर निघून गेल्यानंतर शहराच्या कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये पुन्हा कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत. नव्वद हजार रूपये दुरूस्तीचा खर्च तातडीने होत नाही आणि स्थायी समितीतून हा विषय तात्काळ रद्द केला जातो म्हणजेच साशा कंपनीचे काळजीवाहू सरकार पालिकेत कोणाच्या आशीर्वादाने नांदते याचा जाब आरोग्य विभागाला विचारण्याची वेळ आली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकरुणानिधी यांची प्रकृती पुन्हा खालावली\nNext articleकिमान रक्‍कम नसलेल्यांकडून दंड\nराजवाडा चौपाटीवरील फ्लेक्‍स बोर्डमुळे झाडं सोसतायत मरणयातना\nरेल्वे अपघात एकाचा मृत्यू, घातपाताचा संशय\nजिल्ह्यात दूध संकलनात वाढ आंदोलनाची धार झाली कमी\nहुतात्मा स्मारके प्रेरणास्थळ बनावीत\nजिल्ह्यात कमी निधीमध्ये अधिक सिंचनाचे काम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://m4marathi.com/v2/category/marathi-recipes/page/2/", "date_download": "2018-08-18T09:08:27Z", "digest": "sha1:U275447WORFHKP722R2W5ATLTAMD2R3F", "length": 5827, "nlines": 99, "source_domain": "m4marathi.com", "title": "पाककला | m4marathi - Part 2", "raw_content": "\nसाहित्य :- १) एक वाटी मैदा २) अर्धी वाटी दुध ३) दोन अंडी ४) एक मोठा साखर ५) एक मोठा चमचा लोणी ६) चवीनुसार मीठ . कृती :-\nसाहित्य :- १) कांद्याची पात एक जुडी २) हरभरा डाळीचं पीठ एक वाटी ३) हळद अर्धा चमचा ४) मिरची पावडर एक चमचा ५) तेल पळीभर ६) जिरं एक\nसाहित्य :- १) दोन अंडी उकडून त्याचे छोटे छोटे तुकडे करावेत २) आठ पावाचे स्लाईस ३) लोणी किंवा अमूल बटर ४) अर्धा चमचा मस्टर्ड पावडर ५) चवीनुसार मीठ\nसाहित्य :- १) चार बटाटे , लिंबू अर्धा २) चार ब्रेड स्लाईस ३) अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर ४) चार ते पाच हिरव्या मिरच्या ५) दोन चमचे मक्याचे\nसाहित्य :- १) तीन वाटया तांदूळ २) एक वाटी उडीदडाळ ३) पाऊण वाटी तूरडाळ ४) मुठभर पोहे , तेल ५) दोन ते तीन चमचे आंबट दही ६) चवीपुरते\nसाहित्य :- १) एक वाटी तांदळाचं पीठ २) एक वाटी दुध ३) पाव वाटी पाणी ४) एक चमचा साखर ५) पाव चमचा जिरं ६) थोडं तेल ७) चवीनुसार\nसाहित्य :- १) एक वाटी मैदा २) अर्धी वाटी तांदळाचं पीठ ३) एक चमचा तेल ४) अर्धा चमचा फ्रुट सॉल्ट ५) दोन वाटया पाणी ६) कसूरी मेथी एक\nसाहित्य :- १) एक वाटी नाचणी पीठ २) एक मोठा चमचा तेल ३) एक वाटी दुध ४) एक वाटी पाणी ५) चवीपुरती साखर ६) चवीनुसार मीठ . कृती\n(‘करमल’ हे दक्षिण कोकणात पिकणारं आंबटसर चवीचं फळ आहे . त्याचं लोणचं , भाजी छान होते .) साहित्य :- १) करमलं तीन-चार २) मीठ , तिखट ३) मेथी\nसाहित्य :- १) ढोबळी मिरच्या (सिमला मिरच्या) चार २) फ्लॉवर अर्धा किलो , मोठे बटाटे दोन ३) कांदे मध्यम तीन , लाल टोमाटो दोन-चार ४) गाजर एक ,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/january-17/", "date_download": "2018-08-18T09:14:18Z", "digest": "sha1:TQMXKMHRKIVSGEMV5MWCBU6ND3RRCG66", "length": 6924, "nlines": 155, "source_domain": "www.marathimati.net", "title": "१७ जानेवारी दिनविशेष | January 17", "raw_content": "\n१९८१ : नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव साजरा झाला.\n१९५६ : बेळगाव – कारवार आणि बिदर जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा.\n१७०६ : बेंजामिन फ्रँकलिन.\n१८६० : रशियन साहित्यिक आंतोन चेक्कॉव्ह.\n१९०६ : कुटुंब नियोजनाच्या कार्यकर्त्या शकुंतला परांजपे.\n१९४४ : हॉकीपटू जगतसिंग.\n१८९५ : विठ्ठल दत्तात्रय घाटे, मराठी लेखक, शिक्षणतज्ञ.\n१९०५ : दत्तात्रय रामचंद्र कापरेकर, भारतीय गणितज्ञ.\n१९१३ : यादवेंद्रसिंघ, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१७७१ : पेशव्यांचे सरदार गोपाळराव पटवर्धन.\n२००० : सुरेश हळदणकर, जुन्या पिढीतील गायक आणि अभिनेते.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in दिनविशेष and tagged जन्म, जागतिक दिवस, ठळक घटना, दिनविशेष, बेंजामिन फ्रँकलिन, भारतीय गणितज्ञ, मराठी लेखक, मृत्यू, यादवेंद्रसिंघ, विठ्ठल दत्तात्रय घाटे, शकुंतला परांजपे, १७ जानेवारी on जानेवारी 17, 2013 by प्रशासक.\n← अरे गाढवा हे तर.. पणती वंशाची →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/269/Gela-Daryapaar-Ghardhani.php", "date_download": "2018-08-18T08:36:19Z", "digest": "sha1:3B7XN3PPGK7VHN5ORHVYJV23DYVG3GBH", "length": 11541, "nlines": 151, "source_domain": "www.gadima.com", "title": "Gela Daryapaar Ghardhani -: गेला दर्यापार घरधनी : BhavGeete (Ga.Di.Madgulkar|Gajanan Watve|Gajanan Watve) | Marathi Song", "raw_content": "\nसार्‍या जगासाठी द्यावा गुरुदेवा एक वर\nजीव जीव सुखी व्हावा,स्वर्ग यावा पृथ्वीवर\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nपुरती ओळख नव्हती झाली\nअंगाची ना हळद निघाली\nअजुनी नाही देवक उठलं\nपलटण घेउनि बोट चालली\nपरतुनि राया कधि येणार\nअशीच का रे विरघळणार\nमहाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.\nजा बाळे जा सुखे सासरी\nका असा गेलास तू\nकशी मी सांगु वडिलांपुढे\nकिती वयाचे धराल भय हे\nलपविलास तू हिरवा चाफा\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.blogspot.com/2011/03/", "date_download": "2018-08-18T09:13:52Z", "digest": "sha1:WPEE3LOJCQEMZDD5OPSWDXMC2C653TNV", "length": 9670, "nlines": 169, "source_domain": "aisiakshare.blogspot.com", "title": "ऐसी अक्षरे: March 2011", "raw_content": "\nचोहीकडे जयघोष झाला बहोत खूब अन् वाहवा मैफलीत या रंग भरण्या 'मंदार' हा आला पहा...\nढूँढते रहे उनकी आँखोंमें खुदको\nऔर सोचते रहे बस एक ही बात\nवो खुबसूरती जिसपे हुए हम फिदा\nन जाने शायद हमारी ही परछाई थी\nLabels: कविता, शायरी, हिंदी\n'वाहवा' - कवी म. भा. चव्हाण\nआधुनिक मराठी गझलचे प्रणेते, कवी म.भा.चव्हाण यांच्या 'वाहवा' या गझला, रुबाया आणि शेरोशायरीच्या संग्रहासाठी गझलसम्राट सुरेश भट यांनी लिहिलेली प्रस्तावना -\n“श्री. म. भा. चव्हाण ह्यांचा हा पहिला गझलसंग्रह ह्या संग्रहात त्यांच्या एकूण ५२ निवडक गझला आहेत. मी स्वतः या गझला निवडलेल्या आहेत आणि त्यात वेचक तेवढेच शेर राहू दिलेले आहेत. या संग्रहाच्या निमित्ताने 'गझल' हा एक सुंदर मराठी काव्यप्रकार महाराष्ट्रात लोकप्रिय होऊन रुजायला निश्चित मदतच होणार आहे.\nतसा विचार केला तर श्री. म. भा. चव्हाण यांनी आजपर्यंत कविता, पोवाडा, लावणी, अभंगापासून वगापर्यंत सर्वच प्रकार हाताळलेले आहेत. पण माझे स्वतःचे असे मत आहे की, त्यातल्या त्यात त्यांना गझल व लावणी हे दोन काव्यप्रकार फार धार्जिणे आहेत. निखळ मराठी भाषा आणि मराठमोळा अभिव्यक्ती ही चव्हाणांच्या लिखाणाची अंगभूत वैशिष्ट्ये आहेत.\nआज मराठी गझल हा नितांत सुंदर काव्यप्रकार महाराष्ट्रातील बहुजन समाजाने, सामान्य जनतेने उचलून धरलेला आहे. रसिक तर आधीपासूनच आहेत; पण उत्तम गझल लिहिणारेही निर्माण होत आहेत.\nश्री. म. भा. चव्हाण या नव्या साहित्यिक वस्तुस्थितीचे जिवंत उदाहरण आहेत\nकाव्य असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र असो, जो अस्सल असेल तोच शेवटापर्यंत आणि शेवटानंतरही टिकतो; आणि उसने चन्द्रबल आणून काही काळापुरते 'पुढे' येणारे लोक फक्त मागेच जात नाहीत, तर काळाच्या गर्तेत खोल गाडले जातात. त्यांची नावनिशाणीही शिल्लक उरत नाही.\nया गझलसंग्रहानंतरचा काळ म्हणजे श्री. म. भा. चव्हाण यांची खरी कसोटी आहे. मराठी माणसांना हा गझलसंग्रह आवडणार आहे, याची दखल घेतली जाईल हे मला ठाऊक आहे; पण हा तर प्रारंभ आहे. चव्हाणांनी याहून अधिक सुंदर लेखन सातत्याने केले पाहिजे आणि स्वतःचे व काळाचे भान ठेवले पाहिजे.\nआज श्री. म. भा. चव्हाण यांचा हा गझलसंग्रह आपण वाचत आहात. उद्या फक्त चव्हाणच नव्हेत, तर त्यांच्या पाठोपाठ अनेक प्रतिभाशाली कवींचे गझलसंग्रह मराठी माणसांना वाचायला मिळणार आहेत. इतर काव्यप्रकारांबरोबरच मराठी गझलही महाराष्ट्रात फुलत जाणार आहे.\nगझल लिहिणारे कवी इतर कोणत्याही काव्यप्रकाराला दूषणे देत नसतात. दुसर्‍याला नावे ठेवून स्वतःच्या निर्मितीचा अस्सलपणा आणि मोठेपणा शाबित करता येत नसतो. सर्वांनी आपापल्या परीने लिहावे आणि मराठी मायबोली समृद्ध करावी. मराठी काव्याचे आकाश सार्‍या काव्यप्रकारांसाठी आहे आणि याउपरही कुणाचा आक्षेप असेल, तर श्री. म. भा. चव्हाण उत्तर देतील -\nकेलेस तू खरेदी आकाश हे कधी\nमाझा पतंग मीही उडवून पाहिला\nश्री. म. भा. चव्हाण ह्यांच्या ह्या गझलसंग्रहामुळे मराठी काव्यक्षेत्रात एक उल्लेखनीय भर पडणार आहे, हे निश्चित.”\n'वाहवा' - कवी म. भा. चव्हाण\nLabels: mabhaa, गझल, मभा, मराठी, संग्रह\nया ब्लॉगवरील नवे लिखाण ई-मेलद्वारे मिळवाः\n'वाहवा' - कवी म. भा. चव्हाण\nया ब्लॉगवरचे विचार आणि शब्द मुक्त आहेत. तुम्ही वाचा आणि इतरांनाही वाचू द्या. - मंदार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.manashakti.org/index.php?q=story/2-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%B6", "date_download": "2018-08-18T09:22:32Z", "digest": "sha1:JPVGJPZAW7LDGCBFPY4FSBYQRWPGOTZR", "length": 5289, "nlines": 94, "source_domain": "www.manashakti.org", "title": "2.\tक्षमेची सूडकथश | Manashakti Research Centre", "raw_content": "\nयेथे सातत्यपूर्ण मनःशांती मिळवण्याच्या सोप्या व व्यावहारीक उपायांची माहिती आहे.\nद्रौपदीचे ओठ थरथर कापत होते. त्या ओठातून कोणते शब्द बाहेर पडणार हे समोरच्या अपराध्याला कळत नव्हते. स्वत: केलेल्या भयानक अपराधाच्या जाणीवेने तो घाबरा झालेला जीव होता.\nद्रौपदीच्या डोळ्यात पाण्याचा पूर होता. आत आलेल्या संतापाची आग या पाण्याने आणखी भडकेल, असे पाहणाऱ्यांना वाटत होते. अश्र्वत्थाम्याने विश्र्वासघात करून, रात्रीच्या रात्री द्रौपदीचे लाडके लेक झोपेतच मारून टाकले होते.\nद्रौपदी अश्र्वत्थाम्याला काय शिक्षा सांगणार होती\nमेलेल्या मुलांचे देह आजूबाजूला पसरलेले होते. र क्त आणि मांस यांचे जळके गोळे, ऐकणाऱ्यांच्या चित्तामधील उग्रता वाढवीत होते.\nद्रौपदीच्या पुटपुटत्या मध्यमा ओलांडली. तिची वैखरी म्हणाली, “सोडून द्या अश्र्वत्थाम्याला. “\nऐकणारे हादरून गेले. त्यांना द्रौपदीचाही राग आला.\nद्रौपदी, हेलावणारा हुंदका आवरीत म्हणाली, “अश्र्वत्थाम्याला मारले तर याच्या आईला किती दु:ख होईल मुलाच्या मरणाने आईला किती दु:ख होते, ते मी आत्ताच अनुभवले आहे. त्याचं दु:ख आणखी कोणाला नको. “\nद्रौपदीच्या दिव्यत्वाने ऐकणारे ओशाळले. त्यांचे हात जोडले गेले आणि त्यांना पुढचे शब्द ऐकू आले, “पांडवांचे गुरू द्रोण यांचा हा मुलगा, आम्हालाही गुरूसमानच असला पाहिजे. “\nअश्र्वत्थाम्याच्या पायाशी वाकलेल्या द्रौपदीने, या संस्कृतीची मान ताठ केली.\nकुठल्यही तापापेक्षा पश्चात्ताप अथिक भयंकर. या पश्र्चातापाच्या खाईत जगणे, हाच सूड आहे, असे क्षणभर अश्र्वत्थाम्याला वाटले.\nमारण्याने सूड घेण्याची परंपर लौकीक आहे. न मारून सूड घेण्याची परंपरा अ-लौकीक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/india-austrolia-test-cricket-match-35153", "date_download": "2018-08-18T08:34:58Z", "digest": "sha1:NE4S42MBSFAKSHN25BTKVG4MGJJPA7XH", "length": 13066, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "india austrolia test cricket match दोन्ही कर्णधारांच्या परिपक्वतेची कसोटी | eSakal", "raw_content": "\nदोन्ही कर्णधारांच्या परिपक्वतेची कसोटी\nबुधवार, 15 मार्च 2017\nरांची - रांचीमध्ये येत्या गुरुवारपासून (ता. 16) सुरू होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली आणि स्टिव स्मिथ या दोन्ही कर्णधारांच्या परिपक्वतेची कसोटी लागणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम असलेल्या या दोन संघांमधील आक्रमकपणाकडेही सर्वांचे लक्ष असेल.\nरांची - रांचीमध्ये येत्या गुरुवारपासून (ता. 16) सुरू होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली आणि स्टिव स्मिथ या दोन्ही कर्णधारांच्या परिपक्वतेची कसोटी लागणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम असलेल्या या दोन संघांमधील आक्रमकपणाकडेही सर्वांचे लक्ष असेल.\nहे दोन संघ परस्परांविरुद्ध भिडतात तेव्हा काटे की टक्कर अपेक्षित असते. बंगळूर कसोटीत स्टिव स्मिथच्या \"ब्रेन फेड' प्रकरणानंतर अधिकच तणाव निर्माण झाला होता. या घटनेनंतर कोहली मैदानावर तसेच मैदानाबाहेरदेखील आक्रमक राहिला होता. स्मिथने झालेल्या चुकीनंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. कर्णधारांच्या दृष्टिकोनाविषयी या घटनेनंतर अनेक माजी क्रिकेटपटूंनी मत व्यक्त केले होते. त्यामुळे आता तिसऱ्या कसोटीत दोन्ही कर्णधार कसे प्रदर्शन करतात याबाबत उत्सुकता वाढली आहे.\nवाघाला पिंजऱ्यात बंद करण्याचा प्रयत्न केला की तो अधिक त्वेशाने हल्ला करतो. बंगळूर कसोटी सामन्यात तसेच घडले. भारतीय संघ पराभवानंतर दडपणाखाली राहील असे वाटले. पण, त्यांनी त्वेषाने खेळ केला. उर्वरित मालिकेतही त्यांच्याकडून असाच खेळ होण्याची शक्‍यता आहे, असे ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक मॅथ्यू वेड याने यापूर्वीच बोलून दाखवले आहे.\nमिशेल स्टार्कच्या माघारीमुळे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. फिरकीस साथ देणाऱ्या खेळपट्टीवर स्टार्कने भारतीय फलंदाजीला हादरे दिले होते. स्टार्कची उणीव पॅट कमिन्स कशी भरून काढतो यावर ऑस्ट्रेलियाची मदार असेल. दुसऱ्या बाजूला भारताचा सलामीवीर मुरली विजय तंदुरुस्त होण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. लोकेश राहुलसाठीही आठवड्याची विश्रांती पथ्यावर पडली आहे.\nऔरंगाबाद : 'एमआयएम'च्या नगरसेवकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा\nऔरंगाबाद : महापालिकेत एमआयएम नगरसेकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या पाच नगरसेवकांविरोधात शुक्रवारी (ता.17) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयएम नगरसेवक...\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून सहाजण जखमी\nबेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने बंगळूरकडे जाणारी व्हीआरएलची आराम बस उलटून चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय...\nपिंपळवंडीला मानव-बिबट सहजीवन जनजागृती\nजुन्नर - पिंपळवंडी ता.जुन्नर येथे मानव व बिबट संघर्ष व सहजीवन याविषयी मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती करण्यात आली. जुन्नर वन विभाग तसेच...\nचिंचवडमध्ये रविवारी रंगणार महिला प्रेरणा संमेलन\nवाल्हेकरवाडी - स्वयंसिद्धा प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड शहर) आणि प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि. 19 ऑगस्ट) चिंचवड...\nघरकामगार, बांधकाम मजूर महिलांची उपेक्षाच\nजळगाव : दिवसरात्र काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, पण डोक्‍यावर हक्काचं छत नाही...सतत कष्ट करूनही पदरी काहीच न पडल्यामुळे अनेकदा उपवास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82", "date_download": "2018-08-18T08:58:47Z", "digest": "sha1:5ZTF3VMQOL6QQVVQ2PDRRJRBTOMPVAYN", "length": 7676, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोतीबिंदू - विकिपीडिया", "raw_content": "\nमोतीबिंदू म्हणजे डोळ्यातील नैसर्गिक भिंग धुरकट होणे होय. सामान्य डोळ्यात प्रकाशकिरण पारदर्शक भिंगाद्वारे मागील पडद्यावर केंद्रित होतात. उत्तम दृष्टीकरिता नैसर्गिक भिंग (लेन्स) पूर्णतः पारदर्शक असणे आवश्‍यक असते. जेव्हा या लेन्सची पारदर्शकता मोतीबिंदू झाल्याने कमी होते तेव्हा रुग्णास अंधूक दिसू लागते. मोतीबिंदू अर्थात लेन्सला आलेला गढूळपणा काळानुसार वाढतच जातो व रुग्णास अधिकाधिक अस्पष्ट दिसू लागते. नेत्रमणी हा बहुतांशी प्रथिने व न्यूक्लिक आम्ल या जैविक रसायनांपासून बनलेला असतो. यात काही कारणांनी बदल झाल्यास नेत्रमण्यांची पारदर्शकता कमी होत जाते. त्यामुळे दृष्टी कमी होते. नेत्रमण्याच्या कोणत्याही भागास पारदर्शकत्व आले तर त्याला मोतीबिंदू असे म्हणतात.\nबरीच वर्षे कामासाठी किंवा काही नेहेमीच्या प्रसंगी सतत प्रखर प्रकाशाला सामोरे गेल्यास.\nधुम्रपान किंवा दारू पिणे.\nग्लॉकोमासारखी डोळ्यांची इतर समस्या असल्यास.\nडोळ्यांच्या बाहुल्या धुरकट किंवा सफेद होणे. डोळ्यांच्या मध्यभागी असणारा काळा गोल म्हणजे बाहुली.\nसर्व काही अस्पष्ठ दिसते.\nप्रकाशामुळे डोळे दुखतात व प्रकाश अतिप्रखर वाटतो.\nरात्रीच्या वेळी प्रकाशाभोवती वलये दिसतात.\nएका डोळ्याने दुहेरी दिसणे.\nरात्रीच्या वेळी स्पष्ट न दिसणे.\nचष्म्याची किंवा दृष्टीची औषधपत्रे सतत बदलणे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०३:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.blogspot.com/2014/03/", "date_download": "2018-08-18T09:12:59Z", "digest": "sha1:O25BYJXPO2GA54C3ZPVWTCGBQOKIZ6VF", "length": 24172, "nlines": 234, "source_domain": "aisiakshare.blogspot.com", "title": "ऐसी अक्षरे: March 2014", "raw_content": "\nचोहीकडे जयघोष झाला बहोत खूब अन् वाहवा मैफलीत या रंग भरण्या 'मंदार' हा आला पहा...\nदेश युवा है, हम युवा हैं\nदेश युवा है, हम युवा हैं\nजीतेंगे, विश्वास हुवा है\nआने दो जो आँधी आये\nपक्का अपना बेस हुवा है\nसोच है, जोश है, और हमारे\nबडे-बुजुर्गों की दुवा है\nसबको लेकर साथ है चलना\nदिल को ये एहसास हुवा है\nदेश युवा है, हम युवा हैं\nजीतेंगे, विश्वास हुवा है\nदेश युवा है, हम युवा हैं\nया माजावरती औषध काय\nशिवसेनेच्या प्रसिद्ध ‘गर्वसे कहो हम हिंदू है’ पासून मनसेच्या ‘गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा’ पर्यंतचा प्रवास जर तुम्हाला नवनिर्माणाचं आणि सुराज्याचं चिन्ह वाटत असेल तर या ‘माजरोगा’ची लागण तुम्हालाही झाली आहे, हे नक्की. शाळेत प्रतिज्ञा म्हणायची - 'भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत...' आणि प्रत्यक्षात मात्र धर्म, जात, राज्य, शहर, वस्ती, अशा नवनवीन मुद्द्यांवर भेदभाव करायचा. हा ‘आपल्या’तला नाही असं दिसलं की लागले सगळेच चोची मारायला. मग ‘आपल्या’सारखेच शंभर कावळे जमा करायचे आणि सण-समारंभ, जयंत्या-पुण्यतिथ्यांच्या निमित्तानं शक्तिप्रदर्शन करत फिरायचं. अशा मिरवणुकांमधल्या स्पीकरचा वाढता आवाज हा मिरवणुकीत सहभागी झालेल्या जनतेच्या ढासळणार्‍या आत्मविश्वासाचं प्रतिक असतं, असं मला नेहमी वाटतं. जेवढा आवाज मोठा, तेवढी माणसं भेदरलेली. आपण कुठल्याही प्रकारे श्रेष्ठ नाही, आपल्यामधे कसलंही विशेष कौशल्य, क‌र्तृत्व नाही, त्यामुळं एकंदरीतच आपला निभाव लागणं कठीण आहे, याची कळत-नकळत जाणीव झालेली माणसं ‘आपल्या’सारख्याच असुरक्षित इतरांचा शोध घेतात आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. पण...\nचार टाळकी एकत्र आली की विधायक कामांऐवजी विध्वंसक कामाचंच प्लॅनिंग सुरु होतं, याचं कारण काय एक तर 'गर्दीचा आयक्यू हा त्यातील सर्व माणसांच्या आयक्यूचा लसावि असतो', हे वैश्विक सत्य. त्यातून आपल्याकडं (भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, त्याहून विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात, आणि त्याहून म्हणजे पुण्यात) भयंकर सुबत्ता आणि स्थैर्य आलेलं आहे. फारसं काम न करता प्रत्येकाला मुबलक (व गरजेपेक्षा जास्त) पैसा मिळतोय. सरकार, प्रशासन, पोलिस वगैरे खूप म्हणजे खूपच सहिष्णुतेनं आणि दयाबुद्धीनं नागरिकांना वागवतायत. (हे वाक्य उपहासानं लिहिलेलं नाही. पुण्याबाहेरील किंवा महाराष्ट्राबाहेरील प्रशासन आणि पोलिसांची भूमिका लक्षात घेतल्यास आपण खूप सुरक्षित आहोत, हे मान्य करावंच लागेल एक तर 'गर्दीचा आयक्यू हा त्यातील सर्व माणसांच्या आयक्यूचा लसावि असतो', हे वैश्विक सत्य. त्यातून आपल्याकडं (भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, त्याहून विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात, आणि त्याहून म्हणजे पुण्यात) भयंकर सुबत्ता आणि स्थैर्य आलेलं आहे. फारसं काम न करता प्रत्येकाला मुबलक (व गरजेपेक्षा जास्त) पैसा मिळतोय. सरकार, प्रशासन, पोलिस वगैरे खूप म्हणजे खूपच सहिष्णुतेनं आणि दयाबुद्धीनं नागरिकांना वागवतायत. (हे वाक्य उपहासानं लिहिलेलं नाही. पुण्याबाहेरील किंवा महाराष्ट्राबाहेरील प्रशासन आणि पोलिसांची भूमिका लक्षात घेतल्यास आपण खूप सुरक्षित आहोत, हे मान्य करावंच लागेल) आपल्याकडं भूकंप, ज्वालामुखी, महापूर, वगैरे नैसर्गिक आपत्तीदेखील यायची शक्यता दूरदूरपर्यंत नाही. अशा परिस्थितीत, आपण अजिंक्य, अमर, अविनाशी वगैरे झाल्यासारखं जन्तेला वाटण्यात काही आश्चर्य नाही. (इथं ‘जन्ता’ म्हणजे ‘आप’वाले म्हणतात तसे फक्त झोपडपट्टीत राहणारे लोक नव्हे. पैशानं, शिक्षणानं, जातीनं, नोकरीनं, किंवा व्यवसायानं माणसाची लेव्हल ठरवून बरेचजण ‘आम जनते’च्या व्याख्येतून स्वतःची सुटका करुन घेतात. पण ही सगळी आवरणं काढून एकंदरीत माणसांचे स्वभाव, वृत्ती, आणि वर्तणूक यांच्या कसोटीवर ‘जनते’ची व्याख्या केली गेली पाहिजे.) या जन्तेला आपल्या आर्थिक आणि सामाजिक स्थैर्याचं आणि सुबत्तेचं श्रेय स्वतःकडंच राखून, उरलेलं अपयश, समस्यांबद्दल मात्र राजकारण, प्रशासन, सरकारला दोष द्यायचा आहे. आणि हा जो धर्माचा, जातीचा, भाषेचा, गावाचा, नावाचा, पैशाचा वगैरे माज आहे ना, त्याची मुळं या स्थैर्य आणि सुबत्तेतच आहेत\nहा आहे आपला आजार. पुण्यात दिवसाढवळ्या बाईकवरुन गोळ्या झाडत दहशतवादी फिरत नाहीत. नदीवरच्या पुलांनीच जोडल्या गेलेल्या पुणे शहराला येता-जाता ‘पूल उडवून देऊ’, अशा धमक्या मिळत नाहीत. पुण्यात (व आजूबाजूच्या मोठ्या परिसरात) कंपन्या बंद पडल्या, नोकर्‍या मिळत नाहीत, वगैरे परिस्थिती सध्याही नाही आणि नजिकच्या भविष्यकाळात येईल असंही दिसत नाही. उलट, नोकरी-धंदा न करता निव्वळ बापजाद्यांच्या जमिनी विकल्या तरी आपल्यासहित पुढच्या काही पिढ्यांची सोय होऊ शकेल, अशी परिस्थिती. प्रत्येक धर्माला, जातीला किमान एक तरी प्रभावशाली नेता मिळालेला आहे, जो त्या-त्या सीझनमधे ‘आपल्या’ जन्तेला चुचकारायचं काम बिनचूक करतोय. इतक्या सुरक्षित आणि कम्फर्टेबल वातावरणात, मुळातच ‘सेन्स’चा अभाव असणार्‍या (खरंतर नॉन्सेन्सच म्हणायचं होतं) जन्तेला माज नाही चढणार तर काय होणार\nआता यावर उपचाराचे दोनच पर्याय -\nपहिला, अस्थैर्य निर्माण करणं, जन्तेला पुन्हा दरिद्री बनवणं, बेसिक सर्व्हायवलसाठी स्ट्रगल करायला लावणं.\nआणि दुसरा, हे स्थैर्य आणि ही सुबत्ता अशीच टिकवून, त्यांचा विवेकबुद्धीनं अधिक प्रगतीसाठी वापर करणं.\nआता आम जनतेच्या व्याख्येत स्वतःलासुद्धा कन्सिडर करुन, यांपैकी कुठला पर्याय सोपा (किंबहुना शक्य) वाटतोय, सांगू शकाल\nया माजावरती औषध काय\nआज पुणं कसं बाळंतिणीच्या खोलीसारखं सजलंय. सगळीकडं भगव्या लंगोट्या वाळत घातलेल्या दिसतायत... काल रात्री बारा वाजता मोटारसायकलींच्या पुंगळ्या काढून 'जय भवानी जय शिवाजी' किंचाळत 'तरुणाई' रस्त्यांवर सांडली होती. आज दिवसभर कर्कश्श आवाजात पोवाडे आणि असंबद्ध गाणी (हो, आत्ताच 'ये देश है वीर जवानों का' आणि 'गणराज रंगी नाचतो' ऐकून आलोय) वाजवली जातायत. संध्याकाळी तर 'चिकनी चमेली' आणि 'तुझा झगा' वगैरे हमखास ऐकायला (आणि बघायला) मिळणार, तेही 'भव्य' स्वरुपात (हो, आमचं महाराजांवरचं प्रेमच भव्य-दिव्य आहे ना\nहोय, आज शिवजयंती आहे… परत आत्ता गेल्या महिन्यातच तर झाली होती आत्ता गेल्या महिन्यातच तर झाली होती असू दे, असू दे. महाराज आहेत ते, मराठी आणि हिंदू माणसाचे (मूळ)हृदयसम्राट. त्यांच्यावर कुठं शंका घ्यायची असू दे, असू दे. महाराज आहेत ते, मराठी आणि हिंदू माणसाचे (मूळ)हृदयसम्राट. त्यांच्यावर कुठं शंका घ्यायची उगाच भावना दुखावल्या जातील, नाही का उगाच भावना दुखावल्या जातील, नाही का वर्षातून दोनदाच काय, मासिक जयंती साजरी करा भौ… आपल्या बापाचं काय जातंय वर्षातून दोनदाच काय, मासिक जयंती साजरी करा भौ… आपल्या बापाचं काय जातंय नाही तरी मराठी माणसाला अभिमान वाटावं अशी गोष्ट शंभर-दोनशे वर्षांतून एखादीच घडते. मग पुढं वर्षानुवर्षं, पिढ्यान्‌पिढ्या नुसती जयंती आणि पुण्यतिथी.\nआता यावर आजूबाजूचे काही ‘वैचारिक हिंदुत्ववादी’ (विरोधाभास वाटतोय खरा, पण लेट्स अझ्युम) म्हणतात की, “जयंती-स्मृतिदिन वगैरे साजरे केलेच पाहिजेत, जेणेकरुन या थोर विभूतींचा वसा पुढे घेऊन जाता येईल. शिवाय या दिवशी काही चांगले आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमही होतातच. पेला अर्धा आहे अजून… तळाला गेलेला नाही”, वगैरे वगैरे\nखरं सांगायचं तर, हे 'अर्धा पेला' तत्त्वज्ञान म्हणजे स्वतःची फसवणूक आहे. शिवजयंती किंवा सार्वजनिक गणेशोत्सव म्हटलं की डोळ्यांसमोर काय चित्र उभं राहतं, हा प्रश्न आपल्या आजूबाजूच्या लोकांना (आणि स्वतःलाही) विचारून बघा. किती जण 'चांगले आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम, विचारांचा वसा' वगैरे उत्तर देतात पहा. सगळ्यांच्या दृष्टीनं हे असले सण आणि जयंत्या-मयंत्या म्हणजे डोक्याला तापच असतो. ट्रॅफीकची वाट, रस्त्यांचा सत्यानाश, कानांवर अत्याचार, अतिउत्साही भक्तांचा आणि कार्यकर्त्यांचा माज, अशाच गोष्टी समोर येतात. हे वास्तव स्विकारल्याशिवाय त्यावर उपाय शोधता येणार नाही. त्यामुळं आपला समाज आजारी आहे, हे सत्य स्वीकारणं गरजेचं आहे आम्ही निरोगी आहोत, या भ्रमात राहिल्यास उपचाराची आशाच उरणार नाही…\nअसो. आता येत्या १४ एप्रिलच्या आंबेडकर जयंतीची तयारी महिनाभर आधीच जोमात सुरु आहे. १४ एप्रिलची होर्डींग्ज १२ मार्चलाच लावली गेलीत. तेवढ्या आठवड्याभरात पुण्यातले कुठले रस्ते टाळायचे, याची यादीच बनवली पाहिजे. म्हणजे किमान स्वतःपुरता मनस्ताप तरी टाळता येईल, नाही का\nमकान की ऊपरी मंज़िल पर अब कोई नहीं रहता\nमकान की ऊपरी मंज़िल पर अब कोई नहीं रहता\nवो कमरे बंद हैं कबसे\nजो चोबीस सीढियां जो उन तक पहुँचती थी, अब ऊपर नहीं जाती\nमकान की ऊपरी मंज़िल पर अब कोई नहीं रहता\nवहाँ कमरों में, इतना याद है मुझको\nखिलौने एक पुरानी टोकरी में भर के रखे थे\nबहुत से तो उठाने, फेंकने, रखने में चूरा हो गए\nवहाँ एक बालकनी भी थी, जहां एक बेंत का झूला लटकता था.\nमेरा एक दोस्त था, तोता, वो रोज़ आता था\nउसको एक हरी मिर्ची खिलाता था\nउसी के सामने एक छत थी, जहाँ पर\nएक मोर बैठा आसमां पर रात भर\nमीठे सितारे चुगता रहता था\nमेरे बच्चों ने वो देखा नहीं,\nवो नीचे की मंजिल पे रहते हैं\nजहाँ पर पियानो रखा है, पुराने पारसी स्टाइल का\nफ्रेज़र से ख़रीदा था, मगर कुछ बेसुरी आवाजें करता है\nके उसकी रीड्स सारी हिल गयी हैं,\nसुरों के ऊपर दूसरे सुर चढ़ गए हैं\nउसी मंज़िल पे एक पुश्तैनी बैठक थी\nजहाँ पुरखों की तसवीरें लटकती थी\nमैं सीधा करता रहता था, हवा फिर टेढा कर जाती\nबहू को मूछों वाले सारे पुरखे क्लीशे लगते थे\nमेरे बच्चों ने आखिर उनको कीलों से उतारा,\nपुराने न्यूज़ पेपर में उन्हें महफूज़ कर के रख दिया था\nमेरा भांजा ले जाता है फिल्मो में\nकभी सेट पर लगाता है, किराया मिलता है उनसे\nमेरी मंज़िल पे मेरे सामने\nमेहमानखाना है, मेरे पोते कभी\nअमरीका से आये तो रुकते हैं\nअलग साइज़ में आते हैं वो जितनी बार आते हैं,\nख़ुदा जाने वही आते हैं या\nहर बार कोई दूसरा आता है\nवो एक कमरा जो पीछे की तरफ बंद है,\nजहाँ बत्ती नहीं जलती,\nवहाँ एक रोज़री रखी है, वो उससे महकता है,\nवहां वो दाई रहती थी कि जिसने\nतीनों बच्चों को बड़ा करने में\nअपनी उम्र दे दी थी, मरी तो मैंने\nदफनाया नहीं, महफूज़ करके रख दिया उसको.\nऔर उसके बाद एक दो सीढिया हैं,\nनीचे तहखाने में जाती हैं,\nजहाँ ख़ामोशी रोशन है, सुकून सोया हुआ है,\nबस इतनी सी पहलू में जगह रख कर,\nके जब मैं सीढियों से नीचे आऊँ तो\nउसी के पहलू में बाज़ू पे सर रख कर सो जाऊँ\nमकान की ऊपरी मंज़िल पर अब कोई नहीं रहता...\nमकान की ऊपरी मंज़िल पर अब कोई नहीं रहता\nया ब्लॉगवरील नवे लिखाण ई-मेलद्वारे मिळवाः\nदेश युवा है, हम युवा हैं\nया माजावरती औषध काय\nमकान की ऊपरी मंज़िल पर अब कोई नहीं रहता\nया ब्लॉगवरचे विचार आणि शब्द मुक्त आहेत. तुम्ही वाचा आणि इतरांनाही वाचू द्या. - मंदार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A6_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2018-08-18T08:59:09Z", "digest": "sha1:JRT4IYX32MRDBYN2X3JXZUIN7B6BRNP4", "length": 4933, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दाहोद (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\n(दहोद (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर दाहोद (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nअमरेली • अहमदाबाद पश्चिम • अहमदाबाद पूर्व • आणंद • कच्छ • खेडा • गांधीनगर • छोटाउदेपूर • जामनगर • जुनागढ • दाहोद • बारडोली • पंचमहाल • पाटण • पोरबंदर • बनासकांठा • भरूच • भावनगर • महेसाणा • नवसारी • राजकोट • वडोदरा • वलसाड • साबरकांठा • सुरत • सुरेंद्रनगर\nअहमदाबाद • धंधुका • कपडवंज • मांडवी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ एप्रिल २०१४ रोजी १३:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/celebrities/sanskruti-balgude", "date_download": "2018-08-18T08:18:28Z", "digest": "sha1:3K6FS75JTKAH5YOLVBRR24CIKAADXSBF", "length": 2137, "nlines": 47, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Sanskruti Balgude | Marathi Dhamaal", "raw_content": "\nउंची: 5 फूट 5 इंच (5'5\")\nजन्म ठिकाण: पुणे, महाराष्ट्र, भारत\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation जाणून घ्या,‘अनुराग’च्या नायकाला कायदेशीर नोटीस का बजावली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/re-examinations-class-x-xii-are-july-17-123093", "date_download": "2018-08-18T09:00:50Z", "digest": "sha1:JWS7YJPIFATNNUOC2CPLODPBD4K5BPXV", "length": 12506, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "The re-examinations for Class X-XII are from July 17 दहावी-बारावीची फेरपरीक्षा 17 जुलैपासून | eSakal", "raw_content": "\nदहावी-बारावीची फेरपरीक्षा 17 जुलैपासून\nमंगळवार, 12 जून 2018\nमुंबई : दहावी, बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने घेण्यात येणारी फेरपरीक्षा जुलै महिन्यात होणार आहे. 17 जुलैपासून या फेरपरीक्षेला सुरुवात होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक सोमवारी शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले. विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी 14 जूनपासून ऑनलाईन अर्ज भरता येतील.\nमुंबई : दहावी, बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने घेण्यात येणारी फेरपरीक्षा जुलै महिन्यात होणार आहे. 17 जुलैपासून या फेरपरीक्षेला सुरुवात होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक सोमवारी शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले. विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी 14 जूनपासून ऑनलाईन अर्ज भरता येतील.\nदहावीची फेरपरीक्षा 17 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. बारावीची फेरपरीक्षा 17 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान होईल. बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा 17 जुलै ते 2 ऑगस्टदरम्यान होईल. दहावी आणि बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी आणि श्रेणी परीक्षा 9 जुलै ते 16 जुलैदरम्यान होणार आहे.\nमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेले वेळापत्रक केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे छापील स्वरूपात उपलब्ध असलेले वेळापत्रकच अंतिम असेल. विद्यार्थ्यांनी या छापील वेळापत्रकानुसारच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी. व्हॉट्‌सऍप आणि इतर संकेतस्थळांवर प्रसारित होणारे वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी केले आहे.\nया परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना 14 ते 23 जूनदरम्यान नियमित शुल्कासह अर्ज करता येईल; तर विलंब शुल्कासह 24 ते 27 जूनदरम्यान अर्ज करता येईल.\nभाषणात मोठी ताकद आहे.. : बबन साळगांवकर\nसावंतवाडी : भाषणात मोठी ताकद आहे त्याच वक्तृत्वाचा फायदा घेऊन तब्बल 23 दिवसांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे पहिल्यांदा आमदार बनले आणि त्यांनी नंतर...\nपंकज भूसे यांचा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव\nसरळगांव - महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी होऊन दिलेल्या उद्दिष्टा पेक्षा जास्त वृक्ष लागवड करून उत्कृष्ट कामगिरी केल्याने...\nरावेतला स्वतंत्र पोलिस चौकीची मागणी\nवाल्हेकरवाडी - रावेत परिसराचा विकास झपाट्याने वाढत आहे, त्याचप्रमाणे गुन्हेगारीही वाढत आहे. रावेत परिसरात गुन्हा घडला अथवा काही कारणास्तव पोलिस...\nचिंचवडमध्ये रविवारी रंगणार महिला प्रेरणा संमेलन\nवाल्हेकरवाडी - स्वयंसिद्धा प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड शहर) आणि प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि. 19 ऑगस्ट) चिंचवड...\nदूध भुकटी उद्योग संकटात ; शेतकऱ्यांना वाढीव दराची प्रतीक्षाच\nसोलापूर : दूध व दुग्धजन्य पदार्थांची देशांतर्गत गरज भागवून शिल्लक दुधापासून भुकटी बनविली जाते. परंतु, सद्यःस्थितीत महाराष्ट्रात 30 हजार टन तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/bahujan-lead-justice-135749", "date_download": "2018-08-18T09:00:26Z", "digest": "sha1:HFQQDRN546LXYACHZ6RQVVUTDQKIFDOQ", "length": 14417, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bahujan lead to justice वंचितांच्या न्यायासाठी बहुजन आघाडी - बाळासाहेब आंबेडकर | eSakal", "raw_content": "\nवंचितांच्या न्यायासाठी बहुजन आघाडी - बाळासाहेब आंबेडकर\nरविवार, 5 ऑगस्ट 2018\nयवतमाळ - स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांच्या काळात कोणत्याही सरकारने उपेक्षित घटकाला न्याय दिला नाही. त्यामुळे या घटकाच्या मनात आक्रोश आहे. वंचितांच्या न्यायासाठी बहुजन वंचित आघाडीची वज्रमूठ बांधण्यात आली, असे मत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले.\nयवतमाळ - स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांच्या काळात कोणत्याही सरकारने उपेक्षित घटकाला न्याय दिला नाही. त्यामुळे या घटकाच्या मनात आक्रोश आहे. वंचितांच्या न्यायासाठी बहुजन वंचित आघाडीची वज्रमूठ बांधण्यात आली, असे मत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले.\nसंवाद यात्रेनिमित्त यवतमाळात आले असता शनिवारी (ता.चार) येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २७ जूनला पंढरपूर येथे धनगर समाजाचा मेळावा पार पडला. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप या पक्षांनी न्याय न देता आमच्या वाटेला केवळ निवेदन व आंदोलने दिली. एकही प्रश्‍न सोडवू शकले नाही. अधिवेशनांतर झालेल्या बैठकीत बहुजन वंचित आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुस्लिम, धनगर व वंचित समाज घटकासोबत संवाद साधण्यासाठी ही यात्रा सुरू आहे. एकमेकांबाबत असलेले गैरसमज संवादातून दूर होत आहेत. आगामी काळात जाहीर मेळावे घेण्यात येणार आहेत. २८ सप्टेंबरला एक सोलापूर येथे आरक्षण या विषयावर, तर २० ऑक्‍टोबरला औरंगाबाद येथे औद्योगिक, रोजगार, जलसंधारण, आर्थिक, सहकार या विषयावर अधिवेशन घेण्यात येणार असल्याची माहिती ॲड. आंबेडकर यांनी दिली.\nसध्याचे मुख्यमंत्री मनुवैदिक परंपरा मानणारे आहेत. संभाजी भिडेंना वाचविण्याचे काम त्यांनी केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. आरक्षणाच्या मागणीबाबत शरद पवार यांनी मांडलेल्या विचाराबाबत त्यांनीच आराखडा मांडला पाहिजे. आर्थिक आधारावर आरक्षण मिळू शकत नाही, असेही ॲड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले. यावेळी ‘उपरा’कार लक्ष्मण माने, ॲड. विजय मोरे, नगराध्यक्ष युसूफ पुंजानी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र तलवारे, माजी जिल्हाध्यक्ष खंडेश्‍वर कांबळे उपस्थित होते.\nकाँग्रेससोबत युतीचे दार उघडे\nवर्तमान सत्ताधाऱ्यांकडून भारतीय संविधानाला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हे संविधान पुढेही चालले पाहिजे, असे वाटत असलेल्या काँग्रेसला युतीची ऑफर दिली. लोकसभेच्या एकूण बारा जागा माळी, ओबीसी, धनगर, भटके विमुक्त, मुसलमान या घटकांसाठी प्रत्येकी दोनप्रमाणे मागण्यात येतील. आपल्या अधिकाराचे रक्षण संविधानामुळेच होऊ शकते, ही बाब सर्वच समाजघटकाच्या लक्षात आली आहे, असेही ॲड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले.\nभाषणात मोठी ताकद आहे.. : बबन साळगांवकर\nसावंतवाडी : भाषणात मोठी ताकद आहे त्याच वक्तृत्वाचा फायदा घेऊन तब्बल 23 दिवसांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे पहिल्यांदा आमदार बनले आणि त्यांनी नंतर...\nऔरंगाबाद : 'एमआयएम'च्या नगरसेवकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा\nऔरंगाबाद : महापालिकेत एमआयएम नगरसेकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या पाच नगरसेवकांविरोधात शुक्रवारी (ता.17) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयएम नगरसेवक...\nउंड्री - पाचव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजूर ठार\nउंड्री - गुलाम अली नगर गल्ली नं 6 दि.13 ऑगस्ट दु.12.30 वाजता एका निर्माणाधीन इमारतीचे काम सुरू असताना पाचव्या मजल्यावर पडून राजशेखर माशाले (वय 33...\nपिंपळवंडीला मानव-बिबट सहजीवन जनजागृती\nजुन्नर - पिंपळवंडी ता.जुन्नर येथे मानव व बिबट संघर्ष व सहजीवन याविषयी मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती करण्यात आली. जुन्नर वन विभाग तसेच...\nवाहून गेलेला तरुण तीस तासांनंतरही सापडेना\nजळगाव ः येथील अयोध्यानगराजवळील नाल्याला काल झालेल्या पावसामुळे पूर आला होता. या पुरात इतर नागरिकांना मदत करणारा तरुण पाय घसरून नाल्यात पडून वाहून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-tennis/austrolian-open-women-tennis-competition-27672", "date_download": "2018-08-18T08:39:46Z", "digest": "sha1:ALBWZ3TW57VN34BHEAB7KW6Q76DEDW7U", "length": 16266, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "austrolian open women tennis competition क्रोएशियाच्या मिर्यानाची स्वप्नवत घोडदौड कायम | eSakal", "raw_content": "\nक्रोएशियाच्या मिर्यानाची स्वप्नवत घोडदौड कायम\nगुरुवार, 26 जानेवारी 2017\nमेलबर्न - क्रोएशियाची टेनिसपटू मिर्याना ल्युचिच-बॅरोनी हिने ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीतील घोडदौड कायम राखत उपांत्य फेरीत धडक मारली. तिने कॅरोलिना प्लिस्कोवाला हरविले. वयाच्या 34व्या वर्षी ही कामगिरी केल्यानंतर आता तिच्यासमोर 35 वर्षांच्या सेरेना विल्यम्सचे आव्हान असेल. या दोघींत 1998च्या विंबल्डनची उपांत्य लढत झाली होती. त्यात सेरेनाची सरशी झाली होती.\nमेलबर्न - क्रोएशियाची टेनिसपटू मिर्याना ल्युचिच-बॅरोनी हिने ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीतील घोडदौड कायम राखत उपांत्य फेरीत धडक मारली. तिने कॅरोलिना प्लिस्कोवाला हरविले. वयाच्या 34व्या वर्षी ही कामगिरी केल्यानंतर आता तिच्यासमोर 35 वर्षांच्या सेरेना विल्यम्सचे आव्हान असेल. या दोघींत 1998च्या विंबल्डनची उपांत्य लढत झाली होती. त्यात सेरेनाची सरशी झाली होती.\nचेक प्रजासत्ताकाच्या कॅरोलीनाचे पारडे मिर्यानाविरुद्ध जड असल्याची चर्चा होती, पण मिर्यानाने 6-4, 3-6, 6-4 असा विजय संपादन केला. मिर्यानाने ज्यूनियर असताना ही स्पर्धा तसेच अमेरिकन ओपन जिंकले होते. एकेरीतही तिने उल्लेखनीय कामगिरी केली, पण नंतर वडील तसेच प्रशिक्षक असलेल्या मरिन्को यांच्याशी तिचा वाद झाला. वडिलांनी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप तिने केला होता. यामुळे या शतकाच्या प्रारंभी तिला कोर्टपासून दूर राहावे लागले होते.\nपुनरागमनानंतर तिने क्रमवारीत 79व्या क्रमांकापर्यंत मजल मारली आहे.\nसहा वेळच्या विजेत्या सेरेना विल्यम्सने ब्रिटनच्या योहाना कॉंटाला 6-2, 6-3 असे हरविले. कॉंटाला नववे मानांकन होते. तिने यापूर्वी नऊ सामने आणि 18 सेटची यशोमालिका राखली होती. कारकिर्दीत प्रथमच सेरेवाविरुद्ध खेळताना तिला गारद व्हावे लागले. सेरेनाने सांगितले की, \"या लढतीपूर्वी मी कॉंटाचे सामने पाहात होते. ती भविष्यातील चॅंपियन नक्कीच आहे. त्यामुळे तिला हरविल्याचा आनंद वाटतो. माझी सर्व्हिस फारशी चांगली होत नव्हती, पण मी निर्धार केला आणि खेळाचा आनंद लुटला.' कॉंटाने ही लढत म्हणजे आयुष्यातील सर्वोत्तम अनुभव असल्याची भावना व्यक्त केली.\nनदालने धडाका कायम राखत कॅनडाच्या मिलॉस राओनीचवर 6-4, 7-6 (9-7), 6-4 अशी मात केली. त्याने तीन वर्षांत प्रथमच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. यापूर्वी 2014 मध्ये फ्रेंच विजेतेपद पटकावण्याच्या मार्गात त्याने ही कामगिरी केली होती. तिसरा मानांकित मिलॉस हा त्याचा आतापर्यंतचा सर्वांत खडतर प्रतिस्पर्धी होता, पण नदालने दोन तास 44 मिनिटांत तीन सेटमध्येच विजय मिळविला. त्याने येथे पाचव्यांदा आणि ग्रॅंड स्लॅम कारकिर्दीत 24व्या वेळी उपांत्य फेरी गाठली. ब्रिस्बेनमधील स्पर्धेत नदालला मिलॉसने हरविले होते. नदालने या पराभवाची परतफेड केली.\nनदालने मिलॉसच्या बॅकहॅंडला लक्ष्य केले. माजी फ्रेंच विजेता देशबांधव कार्लोस मोया याचे नदाल मार्गदर्शन घेत आहे. मोया पूर्वी मिलॉसचे प्रशिक्षक होते. त्यांच्या \"टीप' नदालला उपयुक्त ठरल्या.\nनदालसमोर 15व्या मानांकित बल्गेरियाच्या ग्रिगॉर दिमित्रोवचे आव्हान असेल. ग्रिगॉरने डेव्हिड गॉफीनवर 6-3, 6-2, 6-4 असा विजय मिळविला. ग्रिगॉरला बल्गेरियाच्या प्रेक्षकांचा जोरदार पाठिंबा मिळत आहे.\nया कामगिरीवर माझा विश्‍वासच बसत नाही. देव चांगला आहे इतकेच मी म्हणू शकते. मी भारावून गेले आहे. पूर्वी जे काही वाईट घडले ते ठीक आहे, पण आता माझ्या आयुष्याचे सार्थक झाले आहे.\n- मिर्याना ल्युचिच- बॅरोनी, क्रोएशियाची टेनिसपटू\nऔरंगाबाद : 'एमआयएम'च्या नगरसेवकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा\nऔरंगाबाद : महापालिकेत एमआयएम नगरसेकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या पाच नगरसेवकांविरोधात शुक्रवारी (ता.17) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयएम नगरसेवक...\nपिंपळवंडीला मानव-बिबट सहजीवन जनजागृती\nजुन्नर - पिंपळवंडी ता.जुन्नर येथे मानव व बिबट संघर्ष व सहजीवन याविषयी मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती करण्यात आली. जुन्नर वन विभाग तसेच...\nघरकामगार, बांधकाम मजूर महिलांची उपेक्षाच\nजळगाव : दिवसरात्र काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, पण डोक्‍यावर हक्काचं छत नाही...सतत कष्ट करूनही पदरी काहीच न पडल्यामुळे अनेकदा उपवास...\nडिजिटायझेशन'ने दुर्मिळ ग्रंथही चिरकाल \nजळगाव ः पुस्तकांचा खजिना सांभाळणाऱ्या अनेक वाचनालयांना शतकोत्तरी परंपरा लाभलेली आहे. परंतु काळानुरूप ग्रंथालयांनी तंत्रज्ञानाशी जुळवून, त्या दिशेने...\nविद्यार्थ्यांची जबाबदारी शिक्षकांबरोबर पालकांचीही - प्राध्यापक पंकज गावडे\nनवी सांगवी (पुणे) - \" चारित्र्यवान साने गुरूजींचे जीवन हे त्यांच्या शिक्षकांबरोबर त्यांची वात्सल्यसिंधु आईच्या संस्कारामुळे घडले, त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.kishorborateblogs.in/", "date_download": "2018-08-18T08:41:54Z", "digest": "sha1:3VSTVTTKG2GMGKROPRVMV5T5GLT57VDC", "length": 4430, "nlines": 64, "source_domain": "www.kishorborateblogs.in", "title": "किशोर - MY THOUGHTS", "raw_content": "\nइन जल्लादों को मार दो\nभारताच्या डोक्यावरील जखम, कलम ३७०\nमर्यादेचे बंध तोडावे लागतील\nकाँग्रेसचा DNA तपासायला हवा.\nस्मृति क्षेपणास्त्रापुढे विरोधक निष्प्रभ\nराजने दोस्ती की है ,चापलूसी नही की….\nदोघात तिसरा, आता सगळं विसरा\nप्रादेशिक पक्ष आणि अस्मिता मजबूत होतेय\nभाजपाचा महाराष्ट्र द्रोह भाग- २\nराजकारणाची ऐशी की तैशी\nछावणी बंद, लावणी चालू\nअफझल तो पैदा ही होते है मरने के लिये\nहमें तो अपनोंने लूटा गैरों में कहां दम था……\nइशरत की कहाणी हेडली की जुबानी\nबोली नही, अब गोली चाहिये\nराज ठाकरेंचा बॉलीवूड वर सर्जिकल स्ट्राईक\nतिसरा डोळा भाग- ३२\n*तिसरा डोळा भाग- ३२* परवा काश्मिरमध्ये दगडफेक करून पळून जाणारा एक तरुण सैन्याच्या गाडीखाली सापडून ठार झाला. त्याच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी\nतिसरा डोळा भाग- १४\nएकीकडे संविधान बचाव रॅली काढायची आणि दुसरीकडे कुरआनाचे प्रवचन देत मुस्लिम समाजाला कुरआनातीलच कायदे लागू आहेत आणि त्यांना त्या प्रमाणेच\nकारभारी दमानं, होऊ द्या दमानं\nसरकार मग ते केंद्रातले असू द्या, अगर राज्यातले. त्याची धोरणं ही देशातील शेतकरी, नोकरदार, कामगार, छोटे व्यावसायिक आणि विद्यार्थी\nभावनेचा बाजार, त्याला सत्तेचा आधार\nभारत हा चमत्कारांचा देश आहे. इथं चमत्कार करणारावर लगेच विश्वास ठेवला जातो आणि त्याला नमस्कार ही केला जातो. भारताचा धार्मिक\nनवीन पोस्ट ई-मेल वर मागवा.\nई-मेल आयडी खाली नमूद करा.\nतिसरा डोळा भाग- ३२\nतिसरा डोळा भाग- १४\nकारभारी दमानं, होऊ द्या दमानं\nभावनेचा बाजार, त्याला सत्तेचा आधार\nइन जल्लादों को मार दो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://shubhamd96.wordpress.com/", "date_download": "2018-08-18T08:14:10Z", "digest": "sha1:EHIDDYKSPVBMK5MFB6VB3VR5EKXKYPI5", "length": 5547, "nlines": 63, "source_domain": "shubhamd96.wordpress.com", "title": "SHUBHAM – Keep writting", "raw_content": "\nपुस्तक : इकडम् तिकडम् लेखक : बा. ग. जोशी प्रकाशक : रिया पब्लिकेशन्स पाने : 264 भाषा : मराठी साहित्य प्रकार: लेख वाचक : सर्व वयोगटातील. हे पुस्तक हातात पडताच याची उत्सुकता लागते ती त्याच्या नावामुळे पण हे पुस्तक लहान मुलांसाठी आहे असा गैरसमज चुकीचा आहे. या पुस्तकात लेखकाने आपल्या जीवनातल्या अनेक विषयांवर लेख लिहिले …\nपुस्तक : ययाति लेखक : वि. स. खांडेकर (विष्णू सखाराम उर्फ भाऊसाहेब खांडेकर) प्रकाशक : मेहता पुब्लिकेशन्स पाने : ४२० भाषा : मराठी साहित्य प्रकार: सामाजिक कादंबरी वाचक : १४ वर्षांवरील अनेक नावाजलेल्या लेखकांमध्ये वि. स. खांडेकर यांचा समावेश होतो. आणि वि. स. खांडेकर यांच्या साहित्यात सर्वाधिक प्रसिद्धी मिळालेला पुस्तक आहे ययाती ययाती कादंबरी ही …\nपुस्तक : मन में है विश्वास लेखक : IPS विश्वास नांगरे पाटील प्रकाशक : राजहंस प्रकाशन प्रा. लि. पाने : 204 भाषा : मराठी साहित्य प्रकार: आत्मचरित्र Review: एरवी इंग्रजीत Review देणारा मी आज मराठीत लिहितोय त्याचं कारण म्हणजे मनावर आणि विचारांवर छाप सोडणाऱ्या पुस्तकाची समीक्षा करण्यासाठी शब्दभांडार तितकाच विपुल हवं.मन में है विश्वास हे …\nठिकाण: प्रबळगड ( कलावंतीन सुळे) पत्ता : ता. पनवेल जि. रायगड रा. महाराष्ट्र इतिहास: प्रवास: तुम्ही पनवेल बस स्टॉप पर्यंत पोहचा. पनवेल रेल्वे स्थानक हार्बर लाईन वरील शेवटचे स्थानक आहे. रेल्वे स्टेशन च्या मागेच चालत 5 मिनीटावर पनवेल स्थानक आहे. पनवेल स्थानकावर 'ठाकूरवाडी'ला जाणारी बस पकडा. बसची वेळ माहिती करून गेलात तर वेळ वाया जाणार …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://punerispeaks.com/active-dumping-mobile-case/", "date_download": "2018-08-18T08:40:44Z", "digest": "sha1:37QLCUDEFRO7PWZSW3PPGY6T4ZHY7HXX", "length": 8859, "nlines": 91, "source_domain": "punerispeaks.com", "title": "मोबाईल एअरबॅग केस डिज़ाइनचा शोध, पडताच स्वयंचलितरित्या उघडून मोबाइलला वाचवणार", "raw_content": "\nमोबाईल एअरबॅग केस डिज़ाइनचा शोध, पडताच स्वयंचलितरित्या उघडून मोबाइलला वाचवणार\nजर्मनीच्या एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याने ‘मोबाईल एअरबॅग’ केस डिज़ाइनचा शोध लावला आहे. ही केस फोन पडला जातो तेव्हा स्वयंचलितरित्या उघडली जाते.\nसध्या आपल्याकडे आधीच बाजारात अनेक पर्याय आहेत जे मोबाइलला हानीपासून संरक्षण करू शकतात, जसे की क्रॅक, स्क्रॅप, वॉटर यांपासून संरक्षण देतात. परंतु सहसा ते आकाराने ढोबळ आणि किमतीने जास्त असतात. त्यासाठीच या जर्मन विद्यार्थ्याने मोबाईल एअरबॅग’ केस डिज़ाइनचा पर्याय समोर मांडला आहे. त्याचे हे या केस पेटंट साठी नोंदणीकृत झाले आहे. AD (Active Damping) फोन केस हे मोबाईल पडला असता केस मधील स्प्रिंग उघडली जाऊन मोबाईल ला होणारी इजा झेलू शकते.\nजर्मनीतील आलेन विद्यापीठातील 25 वर्षीय फिलिप फ्रेंझेल ला त्याचा मोबाईल जॅकेट बॅनिस्टर वर ठेवताना फुटला असता मोबाईल एअरबॅग केस डिज़ाइन चा विचार त्याच्या डोक्यात आला.\nजॅकेट बॅनिस्टर वर आदळल्याने हँडसेट मधील इलेक्ट्रॉनिक्स भागाला धक्का लागून मोबाईल खराब झाला होता. फ्रेंझेल ने मोबाईल आदळल्यानंतर ब्रेकिंग टाळण्यासाठी सिस्टम विकसित करणे सुरु केले. मोठ्या आकारात असण्यापेक्षा त्याला लहान आणि प्रगत असा एक केस हवा होता. तब्बल चार वर्षांनंतर, त्याने एका सर्वसाधारण रचनेचा शोध जो एका सेन्सरसह येतो जो फोन पडण्याच्या वेळी ओळखून त्यावर कृती करू शकतो.\n‘मोबाईल एअरबॅग’ रचनेत असलेल्या सेन्सर्सने चार स्प्रिंग्स उघडण्याचा आदेश दिल्यानंतर जमिनीवर फोन आदळताच फोन स्प्रिंग द्वारे अधांतरी राहू शकतो. एकदा स्प्रिंग उघडली गेल्यावर सुद्धा पुन्हा ती केस मध्ये माघारी जाण्याची सुविधा दिली गेली असल्याने आपण या केस चा वापर पुन्हा करू शकतो.\nही ‘मोबाइल एअरबॅग’ किंवा AD (Active Damping) केस सध्या खरेदीसाठी उपलब्ध नाही. तथापि, फ्रेंझेल ने याचे पेटंट घेतले असून जर्मन सोसायटी ऑफ मेकाट्रोनिक्सने त्याच्या या शोधासाठी एक पुरस्कारही दिला आहे. त्याच्या या केस चा व्हिडिओ त्याने प्रसारित केला असून तुम्ही तो येथे पाहू शकता.\nव्हिडिओ प्रमाणे, AD केस फोनवर किमान वजन वाढवते, तर ड्रॉप-शॉक विरुद्ध महत्वाचे संरक्षण देते. फ्रेंझेल फंडींग घेऊन केस चे व्यावसायिकीकरण करण्यासाठी ठरविले असून तो आता या कामात गुंतला आहे.\nतर तुम्हाला कशी वाटली ही केस\nअपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.\nप्लॅस्टिक बंदी: पुण्यात ८००० किलो प्लॅस्टिक जप्त, ३६९००० ₹ चा दंड वसूल\nPrevious articleसोशल मीडिया एक भस्मासूर… पडताळणी न करता मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांसाठी ही पोस्ट\nNext articleमामी आणि जयडी यांनी ‘लागिरं झालं जी’ मालिका का सोडली\nAsian Games 2018: आशियाई क्रीडा स्पर्धा वेळापत्रक, प्रक्षेपण, कबड्डी संघ वेळापत्रक\nपिंपरीत प्रियकराने ‘Shivde, I Am Sorry’ चे ३०० फलक लावले, कोण आहे शिवडे\nअटल बिहारी वाजपेयी माहिती, अटल बिहारी वाजपेयी विशेष , अटल बिहारी वाजपेयी मराठी, अटल बिहारी वाजपेयी कविता\nपुणे तिथे काय उणे: देशात राहण्यासाठी पुणे शहर अव्वल स्थानी\nआरक्षण – एक शोधनिबंध | आरक्षण माहिती | आरक्षण म्हणजे काय\nRaj Thackeray VS Ajit Pawar: पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळ्यात एकमेकांवर टीका, वॉटरकप 2018 विजेते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/social-media-ajit-dada-29818", "date_download": "2018-08-18T08:35:47Z", "digest": "sha1:MKTJC22ZE4IQC2DRPOLZNLP5QK2APT7B", "length": 13657, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "on social media ajit dada अजितदादा \"सोशल' होताहेत..! | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 9 फेब्रुवारी 2017\nमुंबई - राजकारणात कार्यकर्त्यांना दरारा वाटणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हल्ली \"सोशल' होत असल्याचे चित्र आहे. युवक व विद्यार्थ्यांमध्ये झालेली नकारात्मक प्रतिमा सकारात्मक व्हावी यासाठी अजित पवार यांनी संवाद साधण्यावर भर दिल्याने, \"काय सांगता राव, अजितदादा भलतेच सोशल होताहेत' अशी चर्चा \"राष्ट्रवादी'चे युवक व विद्यार्थ्यांमध्ये सुरू आहे.\nमुंबई - राजकारणात कार्यकर्त्यांना दरारा वाटणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हल्ली \"सोशल' होत असल्याचे चित्र आहे. युवक व विद्यार्थ्यांमध्ये झालेली नकारात्मक प्रतिमा सकारात्मक व्हावी यासाठी अजित पवार यांनी संवाद साधण्यावर भर दिल्याने, \"काय सांगता राव, अजितदादा भलतेच सोशल होताहेत' अशी चर्चा \"राष्ट्रवादी'चे युवक व विद्यार्थ्यांमध्ये सुरू आहे.\nसत्तेत असताना अजित पवार व वाद हे समीकरणच बनले होते. राजकारणातला सर्वांत वादग्रस्त नेता अशी त्यांची प्रतिमा झाली होती. या नकारात्मक प्रचाराचा मोठा फटका अजित पवार यांना बसला. मात्र, गेल्या वर्षभरापासून ते विद्यार्थी व युवकांत मनमोकळेपणाने मिसळत आहेत. राज्यभरात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या शाखांचे उद्‌घाटन करण्यास ते प्राधान्य देत आहेत. अनेक शाखांच्या उद्‌घाटनाला ते स्वत: हजर राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. याशिवाय, विद्यार्थी नेत्यांची सतत विचारपुस करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत सोशल मीडियात त्यांच्या चांगल्या उपक्रमांचे कौतुक करत आहेत. कोणत्याही विद्यार्थी नेत्याला काही अडचण असेल तर ती सोडवण्यासाठी अजित पवार स्वत: पुढाकार घेत आहेत.\nसोशल मीडियात फारसे न चमकणारे अजित पवार हल्ली फेसबुकवर सक्रिय झाले आहेत. युवकांच्या व विद्यार्थ्यांचे प्रश्‍न ते या माध्यमातून जाणून घेतात. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी सवलत मिळावी यासाठी त्यांनी स्वत:हून रणनीती आखली होती. विविध विद्यापीठांच्या उपकेंद्राच्या निर्मितीसाठी त्यांनी सतत पाठपुरावा केला. तर, विद्यार्थी संघटनेला मोर्चे काढण्यास भाग पाडले. आतापर्यंत 40 हून अधिक मोर्चे विद्यार्थी राष्ट्रवादीने काढले यामागे अजित पवार यांचीच रणनीती असल्याचे सांगितले जाते. राजकारणात युवक व विद्यार्थ्यांचे स्थान निर्णायक असल्याने अजित पवार यांनी आता त्यांच्याशी जवळीक साधत सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यास प्राधान्य दिल्याचे मानले जात आहे.\nबारामती - विद्या प्रतिष्ठानच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पुरस्कार\nबारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट...\nताडगाव - मोफत आरोग्य शिबिरात गरिब व आदिवासी नागरीकांनी घेतला लाभ\nपाली - सुधागड तालुक्यातील ताडगाव येथे गुड डुअर्स चैरिटीज मुंबई, टिकेडिके परिसर विकास संघर्ष समिती आणि जय भैरवनाथ युवा मित्र मंडळ ताडगांव यांच्या...\nबापजी गेले. आज पुन्हा एकदा माझ्या डोक्‍यावरचे वडिलांचे छत्र हरपले. निव्वळ अवर्णनीय दु:खाचा दुसरा आघात आज माझ्यावर झाला आहे. मन एका क्षणात...\nकारागृह परिसरात बांधकामाची अट उठविली ; अधिसूचना जारी\nसोलापूर : जिल्हा कारागृहाच्या पाचशे मीटर परिसरात बांधकाम न करण्याची अट शासनाने रद्द केली असून, ती शंभर मीटरपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. या...\nपुन्हा माझा बळी देऊ नका - सतेज पाटील\nकोल्हापूर - ‘माझ्यासह कार्यकर्त्यांच्या गाफीलपणामुळे मागील निवडणुकीत माझा बळी गेला. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा माझा बळी देऊ नका’, अशा इशारा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/sant-ravidas-109020900058_1.html", "date_download": "2018-08-18T09:10:15Z", "digest": "sha1:4LTHEDLEUFATL3S43BLHS36RCFKSIJOF", "length": 17620, "nlines": 143, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "''समाजवादी'' संत रविदास | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसंत रविदास यांचा जन्म सन 1398 मध्ये काशी येथे झाला. चर्मकार समाजाच्या रविदासांचा वडिलोपार्जित धंदाही चामड्यापासून पादत्राणे व अन्य वस्तू बनविणे हा होता. परंतु, रविदास लहानपणापासून ईश्वरभक्तीकडेही वळले होते. वाईट कर्म त्यागून परमेश्वर भक्तीकडे जा तोच खरा मार्ग आहे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या जीवनातील अनेक घटना याची साक्ष देणार्‍या आहेत.\nरविदास संत कबीरांचे गुरूबंधू होते. स्वामी रामानंद हे त्यांचे गुरू. रविदासांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजाला उपदेश केला. सतमार्गावरून चालण्यासाठी केलेला त्यांचा उपदेश आजही अंगीकारण्यासारखा आहे. विशेष म्हणजे त्यांच्या भक्तीसाहित्यात नेहमीच्या बोलीतले शब्द होते. त्यामुळे त्यांचे साहित्य लोकांना भावले. त्याशिवाय पारतंत्र्याविषयीची बंडखोरीही रविदासांच्या साहित्यातून दिसून येते. ज्यावेळी मुस्लिम आक्रमक भारतात शिरले त्यावेळी त्यांनी लादलेल्या पारतंत्र्याविषयी रविदासांनी स्पष्टपणे लिहून ठेवले आहे.\nपराधिनता पाप है जान लेहु रे मीत\nरविदास दास पराधीन तो कौन करे है प्रीत\nसामान्याने पराधिनतेला दूर करण्यासाठी निर्भय बनले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. गुलाम होणे हे पाप आहे. अशी त्यांची शिकवण होती.\nरविदासांनी त्या काळी समाजवादाची तुतारी फुंकली होती. स्वतः चर्मकार जातीतून आले असले तरी त्यांना असा सामाजिक भेदभाव अमान्य होता. आपण सगळे एक आहोत, अशी त्यांची भावना होती. त्यांच्या दोह्यातूनही त्यांनी ती मांडली. प्रत्येक जण आपल्या मेहनतीनेच जगतो. कर्म करणार्‍यांना कुणाशी घाबरण्याचे काही कारण नाही. घाबरलात तर संपलात. गुलामी केलीत तर तुमच्यावर कुणीही प्रेम करणार नाही असा इशाराही ते देतात. सामाजिक एकोप्याचे उदाहरण त्यांनी त्यांच्या एका दोह्यातून फार छानपणे मांडले आहे.\nएकै माटी के सम झांडे, सबका एको सिरजनहारा\nरविदास व्यापै एकों घट भीतर, सभको एकै घडै कुम्हारा\nसर्व जीव एकाच मातीतून बनलेली भांडी आहेत. त्यांना बनविणाराही एकच आहे. एकाच परमात्म्याची ही सारी रूपे आहेत. इथे कोणी छोटा मोठा नाही. मेहनतीलाच प्रभूभक्ती समजतो त्याचे जीवनच यशस्वी होईल, असे ते सांगतात.\nसमाजवादी विचारसरणी मांडणारे ते संत होते. त्यांचा समाजवाद खालील ओळीतूनही दिसून येतो.\nऐसा चाहो राज्य में, जहां मिले सबन को अन्न\nछोट बडो सब सम बसे रविदास रसे प्रसन्न\nरविदासांनी कर्म हीच ईश्वररसेवा मानली होती. इथे महाराष्ट्रातल्या गोरा कुंभाराशी ते नाते जोडतात. गोरा कुंभाराने काम करता करता विठ्ठल नाम घेतले आणि त्या नादात स्वतःच्या मुलालाही त्यांनी मातीत कालवून टाकले होते. रविदासही काम करता करताच ईश्वरभक्तीत लीन होत होते. एकदा त्यांना गंगेवर चलण्यासाठी काही लोकांनी सांगितले. परंतु, आज एका व्यक्तीला पादत्राणे बनवून देण्याचे वचन दिले असल्याने मी येऊ शकत नाही, असे स्पष्टपणे सांगून काम हीच आपली ईश्वरभक्ती असल्याचे त्यांनी दाखवून दिले होते. 'मन चंगा तो कठोती में गंगा' मन चांगले असेल तर गंगा आपल्याजवळच असेल या आशयाचा हिंदी वाक्प्रचारही त्यांच्याच दोह्यातून आला आहे.\nग्रहणबद्दल नियम व माहिती\nआकाशात रंगणार अद्भुत सोहळा\nका करतात हात जोडून Namaskar\nगुरुवारी हे 7 उपाय केल्याने सर्व अडचणी दूर होतील\nयावर अधिक वाचा :\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nहिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण\nहिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\nअनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ ...\nप्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण...Read More\nव्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता. कामावर प्रभाव पडेल. अचानक खर्च वाढेल....Read More\nजास्त सहयोग मिळेल. कार्यकुशलतेचा लाभ मिळेल. पारिवारिक लाभ घ्या. नोकरीत विशेष सावधगिरी बाळगा. विश्वासात राहू नये. अनिश्चिततेचे वातावरण. निराशा वाढेल....Read More\n\"आर्थिक नुकसान संभव. कामात गुप्तता राखा. सहयोग मिळेल. संबंध बिघडतील. अव्यवहारिक कामांपासून लांब रहा. आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त ठेवा. मानसिक संतोष...Read More\n\"वैचारिक असंतोष राहील. कामात मन रमणार नाही. तब्बेतीची काळजी घ्या. व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील. आर्थिक जबाबदार्‍या वाढतील. आत्मविश्वास वाढेल. कामात...Read More\n\"आपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिक दृष्‌ टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. अडचणी येतील. सतत...Read More\n\"उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता वाटेल. शत्रुपक्षाच्या कारवाया...Read More\n\"खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. नोकरीत नुकसानी संभव. कामात पारदर्शकता हवी. वैचारिक धारणेत राहू नका....Read More\n\"शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमणार नाही. विश्वास कमी राहील. व्यर्थ ताण जाणवेल. पारिवारिक वाद वाढतील.खर्च...Read More\n\"मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात आत्मविश्वास कमी राहील....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि होऊ शकते. नियंत्रण...Read More\n\"आपल्या प्रयत्नाने उन्नति कराल. धनलाभ होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. आपल्या प्रयत्नांमुळे व्यापारात वृद्धि होईल. नवीन कामांना चालना मिळेल. आपल्या यशाचा...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mohanaprabhudesai.blogspot.com/", "date_download": "2018-08-18T08:59:33Z", "digest": "sha1:MOVE6MIMGRZJLL4ICCFUK6INZFST37F7", "length": 8254, "nlines": 175, "source_domain": "mohanaprabhudesai.blogspot.com", "title": "मोसम", "raw_content": "मोसम, माझ्या वडिलांचं गाव. पण आपल्या मनातला प्रत्येक विचार म्हणजे ’मोसम’ च नाही का त्याच विचारांची अनुभवांची ही शृखंला...कथा, कविता, अनुभव, लेख या माध्यमांतून.\nकर्मभूमीचा जन्मदिन आज साजरा होत असतानाच माझ्या जन्मभूमीत आज माझा कथासंग्रह ’रिक्त’ मेहता\nऋत्विक आणि पर्णिका नऊ महिन्यात कबूल केल्याप्रमाणे या भूतलावर अवतरले. दिवसांच्या बाबतीत केलं दोघांनीही थोडं मागे पुढे. पहिल्यांदाच असं करत होते म्हणून केलं माफ पण पुस्तकाचा जन्म म्हणजे कायमचंच गर्भारपण की काय असं वाटायला लागलं होतं. गर्भारपण निभावणार्‍या प्रकाशकांना इतकी पुस्तकं जन्माला घालायची असतात की त्यामुळे वर्ष सहा महिने मागेपुढे होत असावेत. पुस्तकाने ’मी येत आहे’ असं म्हटलं की मी देखील, आलं, आलं करत पुस्तकाचा एकेक अवयव, म्हणजे मुखपृष्ठ मग मलपृष्ठ असं जे माझ्यापर्यंत पोचत होतं ते सर्वांना दाखवत होते. मुलांना नाच करता यायला लागला, ती गाणं म्हणायला शिकली की कसं पाहुण्यांसमोर आपण करुन दाखवायला लावतो. तसं मी माझ्या मुख आणि मलपृष्ठाला सर्वांसमोर नाचवलं. करता करता चक्क पाना आणि अक्षरांसकट माझं नविन बाळ भूतलावर अवतरलं आहे. तुमच्या सहकार्यानेच ते वाढेल. तेव्हा नक्की वाचा आणि मला कळवा पुस्तकाबद्दल तुमचं मत.\nआगामी डंख नाटकाची जाहिरात. एका जाहिरातीत दिसेल आमच्या नेपथ्यकारांची कम्माल तर दुसर्‍या जाहिरातीत कलाकारांचा सराव. नक्की पाहा दोन्ही जाहिराती आणि शार्लट, नॉर्थकॅरोलायनाच्या (Charlotte, NC) आसपास राहत असाल तर नाटक पाहायला या ही आग्रहपूर्वक विनंती. --\nअभिव्यक्ती संकेतस्थळ - https://marathiekankika.wordpress.com/ (आधीच्या निर्मितीची झलक पाहता येईल.)\nबी. एम. एम. लेखमाला (10)\nचौकात गाडी उभी केली. लाल दिवा हिरवा व्हायची वाट पहात होते. गाडीत पोरं, म्हणजे दोनच आणि नवरा कोंबलेला. हीऽऽऽ बडबड प्रत्येकाची. काय झालं कु...\n’अनुराधा’ दिवाळी अंकातील कथा संपादकांच्या परवानगीने इथे प्रसिद्ध करीत आहे. श्री. व सौ, कथाश्री, साहित्य सहयोग, प्रसाद, सामना या भारतातील तस...\nकर्मभूमीचा जन्मदिन आज साजरा होत असतानाच माझ्या जन्मभूमीत आज माझा कथासंग्रह ’रिक्त’ मेहता प्रकाशनने प्रसिद्ध केला ऋत्विक आणि पर्णिका न...\n\" ऐसी अक्षरे मेळविन \nमाझे ब्लॉग माझे विश्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://marathisumane.blogspot.com/2012/07/blog-post_30.html", "date_download": "2018-08-18T08:18:07Z", "digest": "sha1:VNRKMBGJE5EKMETCUHF3BDHTJ6TFKNQF", "length": 9425, "nlines": 110, "source_domain": "marathisumane.blogspot.com", "title": "मराठी सुमने..: वय वर्षे तीन आणि पहिली कमाई", "raw_content": "\nवय वर्षे तीन आणि पहिली कमाई\nशीर्षक वाचून आश्चर्य वाटले ना\nआजचा लेख आहे माझ्या पिल्लावर जगातल्या कुठल्याही आईप्रमाणे मला आता 'proud mother' असल्याचे फिलिंग आले आहे.\nगोष्ट छोटीशीच पण शेअर करावीशी वाटली तुमच्याबरोबर-\nतर माझ्या तीन वर्षाच्या बछड्याच्या day-care मध्ये खूप छान छान activities सुरु असतात- हो, अगदी रोज ही सर्व छ्बुकडी पण त्यात इतकी रमतात म्हणून सांगू ही सर्व छ्बुकडी पण त्यात इतकी रमतात म्हणून सांगू रोज त्याला day-care मधून घरी घेऊन जाताना त्याची अखंड बडबड सुरु असते, दिवसभर काय केले त्याबद्दल. बऱ्याच वेळेला त्याच्या दोन्ही हातांवर चिमुकल्या चांदण्या रेखलेल्या असतात- तो दिवसभर शहाण्या मुलासारखा वागला म्हणून रोज त्याला day-care मधून घरी घेऊन जाताना त्याची अखंड बडबड सुरु असते, दिवसभर काय केले त्याबद्दल. बऱ्याच वेळेला त्याच्या दोन्ही हातांवर चिमुकल्या चांदण्या रेखलेल्या असतात- तो दिवसभर शहाण्या मुलासारखा वागला म्हणून ते चांदणगोंदण पाहिल्यावर मग त्याला अगदी कुठे ठेऊ आणि कुठे नको असे होऊन जाते. जणूकाही मलाच मोट्ठे बक्षीस मिळाले आहे असा आनंद होतो. त्याच्या चेहेऱ्यावरचे निरागस हसू, मोठ्यामोठ्या डोळ्यात उमटलेले कुतूहल सगळे काही मनाच्या कुपीत साठवून ठेवावेसे वाटते.\nत्याच्या day-care मध्ये जुलै महिन्याची theme होती -' रेन' अर्थात पाऊस इतक्या धमाल गोष्टी होत्या त्याअंतर्गत इतक्या धमाल गोष्टी होत्या त्याअंतर्गत एक दिवस या सर्व मुलांना त्यांचे आवडते chocolate कसे तयार होते त्याचे प्रात्यक्षिक दाखवले. एक दिवस बघते तर पिल्लाच्या हातात दोन-दोन कागदी बेडूक. :) त्याचा पूर्ण weekend त्या बेडूक-द्वयीबरोबर खेळण्यात गेला.\nमग आली नागपंचमी. त्यादिवशी त्याला घरी आणताना पाहिले तर स्वारी सारखी हात पसरून बघत होती. नीट निरखून पहिले तर त्याचे इवलूसे हात मेंदीने रंगलेले.. मुलांना पावसाळा, त्यात येणारे सण, नवजीवीत होणारी जीवसृष्टी यांची ओळख करून देण्याचा किती सुंदर मार्ग आहे न हा\nगेल्या आठवड्यात गम्मतच झाली. day-care मधून बाहेर पडताना अरीनच्या हातात एक थर्माकोलचा छान रंगवलेला कप होता. त्यात त्याने मेथीच्या बिया पेरल्या होत्या. 'आई, हि बघ माझी activity' - तो उत्साहात सांगत होता. गेला आठवडाभर आम्ही दोघे त्या मेथ्याना पाणी घालत आहोत. आता त्या कपातून मेथीची कोवळी पाने डोकावतायत.\nहा सगळा किस्सा मी माझ्या मैत्रिणीला सांगत होते तर ती उत्स्फूर्तपणे म्हणाली - अरे वाह, तेरे बेटे कि पेहेली कमाई अब उसे मेथीकी सब्जी खिलाना..\nछोटेसेच वाक्य, पण माझ्या मनात रुतून बसले. वाटले, खरच सर्वच कमाई काही पैशात नाही मोजता येत. ती मेथीचे दाणे टाकताना वाटलेली उत्सुकता, त्यांना रोज पाणी देताना येणारी मजा आणि आता कोवळी हिरवाई बघताना मुलाच्या चेहेऱ्यावर दाटलेला निरागस आनंद - हि सर्व कमाईच नव्हे काय त्याची आणि माझीही कधीही न संपणारी ....\nपुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन \nनमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...\nपुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन \nनमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...\nनमस्कार वाचकहो, बऱ्याच दिवसात काही लिहिलेच नव्हते. विषय सुचत बरेचसे, पण ते तसेच विरून जात. मुलाची नवीन शाळा, अहोंचे इथे नसणे, होणारी धावप...\nभारत माझा देश आहे…\nनमस्कार, सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा. गेल्या शुक्रवारी \"एअरलिफ्ट\" बघायला गेलो होतो. सुन्दर… निव्वळ अप्रतिम… ...\nवय वर्षे तीन आणि पहिली कमाई\nचटकदार झुणका.. पण जरा हटके :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/kerala-chief-minister-takes-aerial-survey-flood-hit-districts-137180", "date_download": "2018-08-18T08:47:22Z", "digest": "sha1:E7RC3SZJDCUVZJNK5K5KSQGXHKP3PHVI", "length": 11679, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kerala Chief Minister Takes Aerial Survey Of Flood Hit Districts केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त जिल्ह्यांची हवाई पाहणी | eSakal", "raw_content": "\nकेरळच्या मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त जिल्ह्यांची हवाई पाहणी\nरविवार, 12 ऑगस्ट 2018\nमागील काही दिवसांपासून जोरदार पावसाने केरळला झोडपून काढले असून, त्यामुळे राज्यातील पूरस्थितीने गंभीर रूप धारण केले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आज पूरग्रस्त जिल्ह्यांची हवाई पाहणी केली.\nतिरुअनंतपुरम- मागील काही दिवसांपासून जोरदार पावसाने केरळला झोडपून काढले असून, त्यामुळे राज्यातील पूरस्थितीने गंभीर रूप धारण केले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आज पूरग्रस्त जिल्ह्यांची हवाई पाहणी केली.\nइडुक्की जिल्ह्यातील इडुक्की धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कट्टापाना येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहाणार होते. मात्र, खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचे हॅलिकॉप्टर येथे उतरू शकले नाही, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्री वायनाडकडे रवाना झाले. तेथे त्यांनी मदत छावण्यांना भेट दिल्याचे सांगण्यात आले. तसेच, जिल्ह्याधिकारी कार्यालयात बैठकही घेतली.\nहवाई पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसमवेत विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथाला, महसूलमंत्री ई. चंद्रशेखरन, मुख्य सचिव आदी सहभागी झाले होते. केरळमध्ये पुरामुळे बळी गेलेल्यांची संख्या 29 वर पोचली असून, सुमारे 50 हजारांपेक्षा अधिक नागरिकांना मदत छावण्यांमध्ये हलविण्यात आले आहे.\n\"रेड अलर्ट' घोषित जिल्हे\nसंग्रामपूर : वाण धरण ६५ टक्के भरले\nसंग्रामपूर : सातपुडा पर्वतामधील तीन जिल्ह्यांसाठी जलसंजीवनी ठरलेले वाण धरण 65 टक्के भरले आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या ...\nगिरणा धरणात 31 टक्के पाणीसाठा\nपिलखोड (ता. चाळीसगाव) : हरणबारी धरणापाठोपाठ गुरूवारी (ता. 16) केळझर धरणदेखील ओव्हरफ्लो झाले. चणकापूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे त्यातूनही...\nगिरणा धरण झाले 31 टक्के\nचाळीसगाव : हरणबारी धरणापाठोपाठ गुरुवारी (16 ऑगस्ट) केळझर धरण \"ओव्हर फ्लो' झाले. चणकापूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे त्यातूनही मोठ्या प्रमाणावर...\nपंतप्रधानांकडून केरळसाठी 500 कोटींची मदत जाहीर\nतिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल...\nपंतप्रधान मोदी केरळमध्ये दाखल ; पुरपरिस्थितीचा आढावा घेणार\nतिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरात आत्तापर्यंत 300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर कोट्यवधींचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/two-tmcs-grew-uijhi-water-level-129353", "date_download": "2018-08-18T08:47:10Z", "digest": "sha1:G7H4TTASFHZOMDYLB3D4XYWJ5KPQ63L7", "length": 11789, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Two TMCs grew on the Uijhi water level उजनी पाणीपातळीत दोन टीएमसीने वाढली | eSakal", "raw_content": "\nउजनी पाणीपातळीत दोन टीएमसीने वाढली\nसोमवार, 9 जुलै 2018\nसोलापूर - पुणे जिल्ह्यात व उजनी धरण क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत दोन टीएमसीने वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यात व उजनी धरण क्षेत्रामध्ये असाच पाऊस सुरू राहावा अशीच अपेक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे.\nसोलापूर - पुणे जिल्ह्यात व उजनी धरण क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत दोन टीएमसीने वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यात व उजनी धरण क्षेत्रामध्ये असाच पाऊस सुरू राहावा अशीच अपेक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे.\nजिल्ह्याची वरदायिनी म्हणून उजनी धरणाकडे पाहिले जाते. मागील वर्षी धरण 100 टक्‍यांहून अधिक भरले होते. मात्र, उन्हाळी हंगामासाठी धरणातून पाणी सोडल्यामुळे धरणाची पाणीपातळी वजामध्ये गेली आहे. वजा 19 च्या पुढे धरणाची टक्केवारी गेली होती. मात्र, मागील एक-दोन दिवसापासून पुणे जिल्ह्यात व धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ होत आहे. रविवारी सकाळी सहा वाजता धरणात दौंड येथून एक हजार 482 क्‍युसेकचा विसर्ग मिसळत होता. त्यामुळे पाणी पातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे. मागील वर्षी धरणामध्ये जेवढे पाणी होते, तेवढेच पाणी यंदाच्या वर्षीही धरणात झाले आहे. टक्केवारीचा विचार केला तर मागील काही दिवसात धरणात पावणेचार टक्के पाणीसाठा वाढला आहे. तो टीएमसीमध्ये मोजला तर 1.85 टीएमसी इतक्‍या पाण्याची वाढ धरणामध्ये झाल्याचे दिसून येते.\nधरणाची आजची सकाळी सहाची स्थिती कंसात मागील वर्षीची स्थिती धरणातील उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी - वजा 16.37 टक्के (वजा 16.83 टक्के) धरणातील उपयुक्त पाणीसाठा - वजा 8.77 टीएमसी (वजा 9.02 टीएमसी)\nसंग्रामपूर : वाण धरण ६५ टक्के भरले\nसंग्रामपूर : सातपुडा पर्वतामधील तीन जिल्ह्यांसाठी जलसंजीवनी ठरलेले वाण धरण 65 टक्के भरले आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या ...\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून सहाजण जखमी\nबेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने बंगळूरकडे जाणारी व्हीआरएलची आराम बस उलटून चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.solapurcorporation.gov.in/(X(1)S(vf25lc55vrylr5454iwjzu45))/English/eng%20smc%20dept.aspx", "date_download": "2018-08-18T08:47:07Z", "digest": "sha1:NOEM42JRDGAKES3KP5DXT462QWX4BLK2", "length": 3881, "nlines": 84, "source_domain": "www.solapurcorporation.gov.in", "title": "Welcome to Solapur Municipal Corporation, Solapur.", "raw_content": "\n8 कर आकारणी कर संकलन विभाग Open File\n9 ग व सु आकारणी व वसुली विभाग Open File\n10 अन्न परवाना विभाग Open File\n11 बांधकाम परवाना विभाग Open File\n12 नगर रचना विभाग Open File\n13 अभिलेखापाल विभाग Open File\n14 कामगार कल्याण विभाग Open File\n15 विद्युत विभाग Open File\n16 मुख्यलेखापाल विभाग Open File\n17 मुख्यलेखापरीक्षक विभाग Open File\n18 अंतर्गत लेखापरीक्षक विभाग Open File\n19 उद्यान विभाग Open File\n20 ग व सु तांत्रिक विभाग Open File\n21 नगर सचिव विभाग Open File\n23 महिला बालकल्याण विभाग Open File\n24 यु सी डी विभाग Open File\n25 विधान सल्लागार विभाग Open File\n26 स्थानिक संस्था कर विभाग Open File\n27 सामान्य प्रशासन विभाग Open File\n28 शहर हद्दवाढ विभाग Open File\n29 विभागीय कार्यालये १ ते ८ Open File\n30 परिवहन विभाग Open File\n31 प्राथमिक शि७ण मंडळ Open File\n32 हुतात्मा स्मृती मंदिर Open File\n33 नगर अभियंता विभाग Open File\n34 सार्वजनिक अारोग्य अभियंता Open File\n35 अारोग्य विभाग Open File\n36 सा.प्र.वि माहिती अधिकार मधील १ ते १७ ची माहिती Open File\n37 सा.प्र.वि माहिती अधिकार मधील कलम ४ (१) ब (१०) ची माहिती Open File\n41 सोलापूर महापालिका - अास्थापना शेड्युल ( Establishment Schedule) Open File\n42 दि 1-1-17 ते 31-12-2017 अखेर नियमित नियुक्त झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांची तात्पुरती जेष्ठता सूची Open File\n43 आस्थापना - 2 दि १-१-२०१८ अखेर तात्पुरती जेष्ठता सूची Open File\n44 आस्थापना - 2 ( तांत्रिक ) दि १-१-२०१८ अखेर तात्पुरती जेष्ठता सूची Open File\n45 बिगर तांत्रिक सेवकांची दि.०१- ०१-२०१८ अखेरची प्राथमिक स्वरूपाची ज्येष्ठता सुची Open File\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6/word", "date_download": "2018-08-18T08:14:52Z", "digest": "sha1:G7YTLVVPODBOWMJD54DIWIYXWETUUCMA", "length": 8819, "nlines": 115, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - पूर्णानंद", "raw_content": "\nआत्मा जेव्हा शरीर सोडतो तेव्हा त्याचा पुढचा प्रवास कसा असतो\nआनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .\nश्रीपूर्णानंद चरित्र - प्रस्तावना\nआनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .\nश्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय पहिला\nआनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .\nश्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय दुसरा\nआनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .\nश्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय तिसरा\nआनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .\nश्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय चौथा\nआनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .\nश्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय पाचवा\nआनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .\nश्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय सहावा\nआनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .\nश्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय सातवा\nआनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .\nश्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय आठवा\nआनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .\nश्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय नववा\nआनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .\nश्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय दहावा\nआनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .\nश्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय अकरावा\nआनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .\nश्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय बारावा\nआनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .\nश्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय तेरावा\nआनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .\nश्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय चौदावा\nआनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .\nश्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय पंधरावा\nआनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .\nश्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय सोळावा\nआनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .\nश्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय सतरावा\nआनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .\nश्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय अठरावा\nआनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .\nहे व यांनीं प्रारंभ होणारे शब्द ऐ मध्यें पहा .\nस्त्री. ( कों. ) आजी.\nउद्रा . दु : ख - शोकदर्शक उद्रार .\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/gossips/riteish-deshmukh-is-the-chorinthestore", "date_download": "2018-08-18T08:19:16Z", "digest": "sha1:DIBJJP3CA7CCTE6K7DFIM5ZWFI43AROG", "length": 4724, "nlines": 56, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Riteish Deshmukh is the ‘ChorInTheStore’! | Marathi Dhamaal", "raw_content": "\nरितेशची 'ChorInTheStore’ ही काय भानगड\nएखाद्या कलाकाराविषयी सोशल मिडीयावर काही आगळी वेगळी पोस्ट पाहिली की प्रेक्षक त्याकडे जास्त आकर्षित होतात. असंच काहीसं घडलय रितेश देशमुखच्या बाबतीत.\nरितेश देशमुखचा कपड्याची चोरी करतानाचा व्हिडीयो व्हायरल झाला आहे. त्याची चोरी सीसी टिव्हीमध्ये कैद केली आहे. रितेश चोरी का करतोय चोरी करावी लागेल असं नेमकं काय घडलय रितेशच्या बाबतीत\nया व्हिडीयोमध्ये रितेश देशमुख कपडे चोरताना दिसतोय, तर यावरुन अशी शंका येते की हा व्हिडीयो प्रमोशनचा एक भाग तर नसेल ना पण नक्की कोणत्या चित्रपटाचं प्रमोशन असेल हे रवि जाधवचा ‘बॅन्जो’ की ‘हाऊसफुल ३’\nकोणत्या चित्रपटात रितेशचं चोराचं पात्र आहे , हा एक नवीन प्रश्न प्रेक्षकांना सतवत आहे. ‘ChorInTheStore’ हा हॅशटॅग या व्हिडीयोसाठी वापरला जात आहे.\nतुम्हाला हे वाचायला आवडेल \n‘चला हवा येऊ द्या’ का घेतायेत विश्रांती...\n'गच्ची' वर झाला होता गंभीर अपघात\nहि मराठी अभिनेत्री लवकरच करतेय लग्न...\nअमृताला कोणी लिहिल पत्र...\nबघा शनायाने आयुष्यात पहिल्यांदा काय घेतला विकत\nसुबोध भावे करणार प्राजक्ता माळीसोबत स्क्रिन शेअर\n‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित मराठी चित्रपटाची निर्मिती करणार\n लाफ्टर क्वीन प्राजक्ता हनमघरचे झाले शुभमंगल\nइरफान खान आणि डलक्यूअर सलमान यांच्यासोबत झळकणार मिथिला पालकर\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/gossips/whoa-reel-life-rama-madhav-gets-hitched-in-real-life-too", "date_download": "2018-08-18T08:19:13Z", "digest": "sha1:H4TLIQWFXUYWH5LEXZWTUKU36TDGWCJI", "length": 5316, "nlines": 55, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Whoa! Reel-life Rama-Madhav Gets Hitched In Real Life too? | Marathi Dhamaal", "raw_content": "\n रमा माधव…लग्नबेडीत अडकले...म्हणजे काय...त्यांचं तर यापूर्वीच लग्न झालं आहे. गोंधळलात ना...अहो, पण आम्ही इथे सांगतोय ते,ऑन स्क्रिन रमा-माधव या जोडीबद्दल. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘रमा-माधव’ सिनेमातील रमा-माधव म्हणजेच अभिनेत्री पर्ण पेठे आणि अभिनेता आलोक राजवाडे या दोघांचं नुकतंच शुभमंगल झाल्याची बातमी समजतेय. पर्ण आणि आलोक यांचा मित्र असलेला अभिनेता सुयश टिळकनं ही आनंदवार्ता सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केली. परंतु याबाबतची सविस्तर माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे. पर्ण आणि आलोक या दोघांनीसुध्दा प्रायोगिक रंगभूमीवर ब-याच नाटकांमधून एकत्र काम केलं आहे.\n‘रमा-माधव’ सिनेमाद्वारे दोघं प्रथमच सिल्व्हर स्क्रिनवर एकत्र झळकले. ‘विहीर’, ‘राजवाडे अॅण्ड सन्स’ मधून आलोकने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. तर पर्णची प्रमुख भूमिका असलेला ‘फोटोकॉपी’ सिनेमा लवकरच झळकतोय.\nअभिनेता आलोक राजवाडे आणि अभिनेत्री पर्ण पेठेला या आनंदांच्या बतमीनिमित्त मराठी धमाल डॉट कॉमतर्फे हार्दिक शुभेच्छा\nतुम्हाला हे वाचायला आवडेल \n‘चला हवा येऊ द्या’ का घेतायेत विश्रांती...\n'गच्ची' वर झाला होता गंभीर अपघात\nहि मराठी अभिनेत्री लवकरच करतेय लग्न...\nअमृताला कोणी लिहिल पत्र...\nबघा शनायाने आयुष्यात पहिल्यांदा काय घेतला विकत\nसुबोध भावे करणार प्राजक्ता माळीसोबत स्क्रिन शेअर\n‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित मराठी चित्रपटाची निर्मिती करणार\n लाफ्टर क्वीन प्राजक्ता हनमघरचे झाले शुभमंगल\nइरफान खान आणि डलक्यूअर सलमान यांच्यासोबत झळकणार मिथिला पालकर\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation भूषण-प्रार्थनाची जमली जोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/ration-shop-online-process-slip-grain-118322", "date_download": "2018-08-18T09:01:40Z", "digest": "sha1:E647LTIW3UBTJET7KG2OWYH3Q2MQIADF", "length": 13325, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "ration shop online process slip grain पावती निघेना अन्‌ धान्यही मिळेना! | eSakal", "raw_content": "\nपावती निघेना अन्‌ धान्यही मिळेना\nमंगळवार, 22 मे 2018\nवडूज - ऑनलाइन प्रणालीचा वापर करून शासनाने विविध क्षेत्रांत पारदर्शकता आणली असली तरी या ऑनलाईन प्रणालीत अपुऱ्या नेटवर्कची मोठी अडचण ठरत आहे. खटाव, माण तालुक्‍यांतील ग्राहकांना धान्य वितरित करण्यासाठी शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांना पॉस मशिन दिल्या आहेत. मात्र, नेटवर्कच्या अडचणींमुळे ग्राहकांच्या नावाची धान्य खरेदीची पावती निघत नसल्याने दुकानदारांना धान्य देता येत नाही. त्यामुळे अनेक वेळा दुकानदार व ग्राहकांत वादावादीचे प्रसंग घडत आहेत. खटाव तालुक्‍यात १५८ व माण तालुक्‍यात १३९ स्वस्त धान्य दुकानदार आहेत. ग्राहकांना धान्य वितरित करण्यासाठी या दुकानदारांना शासनाने पॉस मशिन दिल्या आहेत.\nवडूज - ऑनलाइन प्रणालीचा वापर करून शासनाने विविध क्षेत्रांत पारदर्शकता आणली असली तरी या ऑनलाईन प्रणालीत अपुऱ्या नेटवर्कची मोठी अडचण ठरत आहे. खटाव, माण तालुक्‍यांतील ग्राहकांना धान्य वितरित करण्यासाठी शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांना पॉस मशिन दिल्या आहेत. मात्र, नेटवर्कच्या अडचणींमुळे ग्राहकांच्या नावाची धान्य खरेदीची पावती निघत नसल्याने दुकानदारांना धान्य देता येत नाही. त्यामुळे अनेक वेळा दुकानदार व ग्राहकांत वादावादीचे प्रसंग घडत आहेत. खटाव तालुक्‍यात १५८ व माण तालुक्‍यात १३९ स्वस्त धान्य दुकानदार आहेत. ग्राहकांना धान्य वितरित करण्यासाठी या दुकानदारांना शासनाने पॉस मशिन दिल्या आहेत. पॉस मशिनवर संबंधित ग्राहकांचे अंगठ्याचे ठसे घेऊन नंतर त्यांच्या नावाची धान्य खरेदीची पावती काढण्यात येते. शासनाने धान्य खरेदीत ऑनलाइन पद्धतीचा वापर केलेल्या या कार्यप्रणालीचे ग्राहकांनी सुरवातीला स्वागत केले. मात्र, दोन्ही तालुक्‍यातील अनेक गावे डोंगराळ तसेच उंच, सखल भागांत व मुख्य दळणवळणाच्या रस्त्यांपासून आत आहेत. त्यामुळे नेटवर्कच्या अडचणींचा मोठा फटका या प्रणालीला बसू लागला आहे. धान्य खरेदीवेळी संबंधित ग्राहकांचे ठसे पॉस मशिनवर उमटण्यात, तसेच त्यांच्या नावाची पावती निघण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना ग्राहकांना धान्य देता येता नसल्याने ग्राहक व दुकानदारांत सातत्याने वादाचे प्रसंग होत आहेत. त्यातही एखाद्या शिधापत्रिकेवर पाच लोकांची नावे असल्यास तीनच लोकांच्या नावाची पावती निघाल्याने तीनच जणांचे धान्य ग्राहकांना घ्यावे लागत आहे. ग्राहकांची अडचण नको म्हणून काही दुकानदार पावती करून ग्राहकांना धान्य देत आहेत.\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nभोकरदनमध्ये नदीत शेतकरी गेला वाहून\nकेदारखेडा (जि. जालना) - भोकरदन तालुक्‍यात गुरुवारी (ता. 16) झालेल्या पावसामुळे गिरिजा नदीला मोठ्या...\nधडपड - शेतकऱ्यांत विश्‍वास निर्माण करण्याची\nसातारा - शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते, हे दाखवून देण्यासाठी युवकाने शेअर फार्मिंगच्या (गटशेती) माध्यमातून खातवळ येथे ४० एकरांत करार शेती करण्याचे...\nमुंबई - शेतीमालावर आधारित सूक्ष्म, लघू व मध्यम अन्नप्रक्रिया उद्योगांना लागणारा पाणीपुरवठा सुलभ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/rahul-kul-bhima-patas-factory-128083", "date_download": "2018-08-18T09:01:53Z", "digest": "sha1:FBC3SRPZDS4JWKWDM6IZ7H5A65ZLHZNH", "length": 14968, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "rahul kul Bhima-Patas Factory 'भीमा-पाटस कारखान्यावर शिंतोडे उडू देणार नाही' | eSakal", "raw_content": "\n'भीमा-पाटस कारखान्यावर शिंतोडे उडू देणार नाही'\nबुधवार, 4 जुलै 2018\nपाटस - ‘‘भीमा-पाटस कारखान्याला मध्यंतरी साखरेचा दर घसरल्याने मोठ्या अडचणी आल्या. मात्र, दोन महिने थांबल्यामुळे साखरेला चांगला बाजारभाव मिळाला. कारखाना अडचणीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न आहेत. यंदा बॅंकेचा एक रुपयाही न घेता कारखाना सुरू करण्याचे नियोजन आहे. कारखान्यावर कोणी शिंतोडे उडविण्याची आम्ही संधी देणार नाही. सभासदांनी आमच्यावर टाकलेल्या विश्‍वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही,’’ असे प्रतिपादन आमदार व कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी केले.\nपाटस - ‘‘भीमा-पाटस कारखान्याला मध्यंतरी साखरेचा दर घसरल्याने मोठ्या अडचणी आल्या. मात्र, दोन महिने थांबल्यामुळे साखरेला चांगला बाजारभाव मिळाला. कारखाना अडचणीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न आहेत. यंदा बॅंकेचा एक रुपयाही न घेता कारखाना सुरू करण्याचे नियोजन आहे. कारखान्यावर कोणी शिंतोडे उडविण्याची आम्ही संधी देणार नाही. सभासदांनी आमच्यावर टाकलेल्या विश्‍वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही,’’ असे प्रतिपादन आमदार व कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी केले.\nपाटस (ता. दौंड) ग्रामपंचायतीच्या एक कोटी ऐंशी लाखाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन आमदार कुल यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी आयोजित सभेत ते बोलत होते. या प्रसंगी रासपचे जिल्हाध्यक्ष हरीश खोमणे, तालुकाध्यक्ष दादा केसकर, सरपंच वैजयंता म्हस्के, योगेंद्र शितोळे, साहेबराव वाबळे, डॉ. मधुकर आव्हाड, संभाजी खडके, कलावती मोहिते, तानाजी केकाण, काका पाटील आदी उपस्थित होते.\nकुल म्हणाले, ‘‘दौंड तालुका विकासाच्या बाबतीत मागे राहणार नाही. इतर तालुक्‍यांच्या तुलनेत दौंड तालुक्‍यात विकासकामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. मात्र, विरोधक जनतेची दिशाभूल करीत आहेत. तालुक्‍यात रस्ते व विजेसंदर्भात ठोस पावले उचलण्यात येत आहेत. शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त रोहित्र बसविण्याचे काम लवकरच सुरू होणार आहेत. शिव-पाणंद रस्ते खुले करण्याच्या भूमी अभिलेखच्या अटी-शर्ती कमी करण्यात आल्या आहेत. विकासाबाबत वरवंडसारखे नियोजन करा. निधी कुठेच कमी पडू देणार नाही.’’\nया वेळी ग्रामपंचायतीचे सदस्य संभाजी चव्हाण व संभाजी खडके यांनी कुल गटात प्रवेश केला. या वेळी अंगणवाडी सेविका व ज्येष्ठ नागरिकांना खुर्च्यांचे वाटप करण्यात आले. साहेबराव वाबळे यांनी प्रास्ताविक; तर डॉ. मधुकर आव्हाड यांनी सूत्रसंचालन केले.\nग्रामपंचायतीने लावलेल्या विकासकामांच्या यादीचा व कार्यक्रमाच्या फ्लेक्‍सवरून विरोधकांनी, विकासकामांचे श्रेय लाटल्याचा आरोप करीत निषेधाचा फ्लेक्‍स लावला. त्याचा कुल यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, ‘‘कामे आम्ही मंजूर करतो. त्याचे भूमिपूजन करताना तुम्हाला लाज वाटत नाही अन्‌ आमचा निषेध कशासाठी करता\nपुण्यातील खडकवासला व इतर धरणे ही केवळ शेतीसाठी आहेत. भविष्यात दौंड तालुक्‍याला शेतीसाठी कधीच पाणी कमी पडणार नाही, याचे नियोजन करीत आहोत. तालुक्‍यातील बेबी कालव्याचे दुसऱ्या टप्प्यातील काम येत्या काही महिन्यांत सुरू करणार आहोत.\n- राहुल कुल, आमदार\nभाषणात मोठी ताकद आहे.. : बबन साळगांवकर\nसावंतवाडी : भाषणात मोठी ताकद आहे त्याच वक्तृत्वाचा फायदा घेऊन तब्बल 23 दिवसांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे पहिल्यांदा आमदार बनले आणि त्यांनी नंतर...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून सहाजण जखमी\nबेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने बंगळूरकडे जाणारी व्हीआरएलची आराम बस उलटून चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय...\nपिंपळवंडीला मानव-बिबट सहजीवन जनजागृती\nजुन्नर - पिंपळवंडी ता.जुन्नर येथे मानव व बिबट संघर्ष व सहजीवन याविषयी मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती करण्यात आली. जुन्नर वन विभाग तसेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/ushira-yenare-sule-ahet/", "date_download": "2018-08-18T09:16:44Z", "digest": "sha1:4MSILVNM5MIGIYNJKERTERVAP7VYHJLU", "length": 5358, "nlines": 142, "source_domain": "www.marathimati.net", "title": "उशिरा येणारे सुळे आहेत | Ushira Yenare Sule Ahet", "raw_content": "\nउशिरा येणारे सुळे आहेत\nघराणेशाहीची खोलवर मुळे आहेत\nनाना-ताई समाजकारणात जुळे आहेत\nउशिरा येणारे सुळे आहेत\nहे असं कसं काय\nया वर्गातील आणखी काही लेख\nघोंगावत लाट येते सुनामी\nप्रेम गाण्यास शेर शायरी आहे\nघेऊ नये उंटाचे मुके\nतुझं फुलणं व्यर्थ आहे\nप्रेम एक खूळ असतं\nआपुलकीचे कोरलेले नांव आहे\nमीरा होती कृष्ण दिवानी\nThis entry was posted in मराठी चारोळी and tagged खुळे, घराणेशाही, चारोळी, सुळे on जुन 3, 2011 by बाळासाहेब गवाणी-पाटील.\n← जग हे संत्र्याची बर्फी →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/317/Dhund-Madhumati-Rat-Re.php", "date_download": "2018-08-18T08:37:52Z", "digest": "sha1:Y77AQKITYJWPZYHMGC2RLWAC2QEWTH2V", "length": 10356, "nlines": 146, "source_domain": "www.gadima.com", "title": "Dhund Madhumati Rat Re -: धुंद मधुमती रात रे : ChitrapatGeete-VeryPopular (Ga.Di.Madgulkar|Lata Mangeshkar|Master Krishnarao) | Marathi Song", "raw_content": "\nलबाड जोडी इमले माड्या, गुणवतांना मात्र झोपडया\nपतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणीहार\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nधुंद मधुमती रात रे\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nधुंद मधुमती रात रे\nतनमन नाचे, यौवन नाचे उगवला रजनीचा नाथ रे\nजललहरी या धीट धावती\nहरित तटांचे ओठ चुंबिती\nयेइ प्रियकरा, येइ मंदिरा, अलि रमले कमलांत रे, नाथ रे\nये रे ये का मग दूर उभा ही घटिकाहि निसटुनी जायची\nफुलतील लाखो तारा परि ही रात कधि कधि ना यायची\nचषक सुधेचा ओठी लावुनि कटिभंवती धरि हात रे, नाथ रे\nगीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हटला, तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहारगीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालाची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसतांना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकुवाला जातांना गळ्यात रुळवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल..\nदिलवरा दिल माझे ओळखा\nदिलवरा दिल माझे ओळखा\nएक वार मज राम दिसावा\nगंगा आली रे अंगणी\nघबाड मिळूदे मला रे खंडोबा\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://granthali.com/product/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-asurendra/", "date_download": "2018-08-18T08:37:47Z", "digest": "sha1:Q5JDASBUR6LWRMOXRG7FNXES6WDNR5G7", "length": 5694, "nlines": 163, "source_domain": "granthali.com", "title": "असुरेंद्र (Asurendra) | Granthali", "raw_content": "\nHome / माहितीपर / असुरेंद्र (Asurendra)\nशहर आत्महत्या करायचं म्हणतंय...\nसूर्य होता रात्रीला ₹500.00 ₹300.00\nरावण अनेक गुण, कला, विद्या, बल यांनी संपन्न होता. तो उच्च कुलोत्पन्न, सुसंस्कृत होता. त्याने ‘रावणसंहिता’ नामकग्रंथ लिहिला आहे. शिव आणि ब्रम्हदेव यांच्याबद्दल त्याच्या मनात श्रद्धा होती. त्याच्या लंकेत ऋषी, ब्राम्हण, दैत्य, दानव, राक्षस राहात होते. तो तिन्ही वेळा स्नानसंध्या करायचा. रामाहून श्रेष्ठ ठरावा असा गुणसंपन्न वीर, असुरांना प्रिय असलेला महाबली रावण याचा आणि असुर जमातींचा नाश का झाला याला रावण कुठवर जबाबदार होता याला रावण कुठवर जबाबदार होता त्याच्या र्‍हासाला कोण कारणीभूत होते त्याच्या र्‍हासाला कोण कारणीभूत होते हे शोधण्याचा हा प्रयत्न…\nअर्वाचीन पाश्चात्य तत्वज्ञान – प्रज्ञावाद (Arvachin-Pashchatya-Tatvdnyan—Pradnyawad)\nआधुनिक अर्थशास्त्राचे निर्माते (Adhunik Arthshastrache Nirmate)\nआधुनिक एकलव्य : आंतरजात आणि दूरशिक्षण (Adhunik Eklavya)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/about-jainism-marathi/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0-110092000017_1.html", "date_download": "2018-08-18T09:09:17Z", "digest": "sha1:ARKCDRJWIV7FHM5EUB6GKJLMRES35CN7", "length": 15247, "nlines": 151, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "महती सागर | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nज्यांनी एकोणीसाव्या शतकात मराठी संतसाहित्याला लक्षणीय योगदान दिले, अशा प्रमुख जैन संतकवींमध्ये महतीसागर यांचा समावेश होतो. ते कारंजा (जि.अकोला,-विदर्भ) येथील भट्टारक पीठाचे होते. त्यांचा जन्म विदर्भातील शेंदरजना (अंसनेर) इथं झाला. ते बहुभाषिक होते. त्यांचे गुरु देवेन्द्रकीर्ती हे होते.\nमहतीसागर यांचं वैशिष्ट्य असं की, त्यांनी विविध प्रकारची काव्यरचना केली. त्यात अभंग पद, स्तोत्रं, व्रतकथात्मक कविता, रुपणा अशा प्रकारचं लेखन आहे. हे लेखन जैन धर्म, जैन तत्त्वज्ञान जैन धार्मिक परंपरा व जैन आचारधर्म इ. विषयक आहे. महती - काव्य - कुंज या ग्रंथात हे लेखन समाविष्ट केलं आहे. हा ग्रंथ प्रकाशित झाला आहे.\nया लेखनाचा तपशील असा आहे.\n१. अभंग - 'दानमाहात्मरक, जिनस्तुतिपर, पंचपरमेष्ठीगुणवर्णनात्मक, पंचकल्याणिकवर्णनात्मक इत्यादी\n२. व्रतकथा : रत्नमयव्रत, शोडसकारणव्रत, आदित्यवार, दशलासण्किव्रत, इ.\n३. पद : चोविस तीर्थंकर - पद, संबोध-सहस्त्रपदी (६४ पदं)\n४. स्तोत्र व स्तुती : सरस्वतीस्तोत्र, चोवीस तीर्थंकर स्तुती इ.\nहा काव्यप्रकार केवळ काही जैन मराठा संतकवींच्या रचनेतच आढळतो. महतीसागरांनी 'चतुर्विशती' चौदा गुण स्थान इ. 'प्ररुपणां' लिहिल्या आहेत. महतीसागरांनी मराठीप्रमाणेच संस्कृतमध्येही लेखन केलं आहे. अष्टक-रचना ही त्यातील उल्लेखनीय रचना. (ज्यालामालिनी अष्टक, 'अरहंताष्टक' इ.)\nआपले गुरु देवेन्द्र यांच्या आदेशावरुन आपण 'पंचकल्याणिकोत्सवकथे' सारखी रचना केली, असं स्वत:या संतकवीनंच म्हटलं आहे. त्या अन्य रचनांचाही (दशलासणिक कथा, स्तेडशसारणी-व्रतकथा इ.) उल्लेख आढळतो.\nप्रथम ते दशलाक्षणिची कथा '\nवदविली बहु आग्रही सत्कथा \nव्रतकथा मज 'षोडशकारणी' अ\nवदविली गुरुने मज तारणी \nजागोनि सद्गुरुचिन्हे, मज जालि आज्ञा \nबछि धरोनि मनी आयु समाप्त केला (केली) \nकल्याणिकोत्सव तश (कथा) मग म्या रचीला (रचीली) \nजैन संतकवी महतीसागरांचं सर्व लेखन धर्म प्रबोधनार्थ होतं, त्यातून त्यांनी जनसामान्यांवर उदात्त संस्कार केले.\nभगवान महावीरांचा अहिंसेविषयी उपदेश\nभगवान महावीरांचा सत्याविषयी उपदेश\nप्रमुख जैन तीर्थ क्षेत्र\nभगवान महावीर यांचा जीवन परिचय\nयावर अधिक वाचा :\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nहिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण\nहिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\nअनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ ...\nप्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण...Read More\nव्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता. कामावर प्रभाव पडेल. अचानक खर्च वाढेल....Read More\nजास्त सहयोग मिळेल. कार्यकुशलतेचा लाभ मिळेल. पारिवारिक लाभ घ्या. नोकरीत विशेष सावधगिरी बाळगा. विश्वासात राहू नये. अनिश्चिततेचे वातावरण. निराशा वाढेल....Read More\n\"आर्थिक नुकसान संभव. कामात गुप्तता राखा. सहयोग मिळेल. संबंध बिघडतील. अव्यवहारिक कामांपासून लांब रहा. आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त ठेवा. मानसिक संतोष...Read More\n\"वैचारिक असंतोष राहील. कामात मन रमणार नाही. तब्बेतीची काळजी घ्या. व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील. आर्थिक जबाबदार्‍या वाढतील. आत्मविश्वास वाढेल. कामात...Read More\n\"आपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिक दृष्‌ टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. अडचणी येतील. सतत...Read More\n\"उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता वाटेल. शत्रुपक्षाच्या कारवाया...Read More\n\"खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. नोकरीत नुकसानी संभव. कामात पारदर्शकता हवी. वैचारिक धारणेत राहू नका....Read More\n\"शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमणार नाही. विश्वास कमी राहील. व्यर्थ ताण जाणवेल. पारिवारिक वाद वाढतील.खर्च...Read More\n\"मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात आत्मविश्वास कमी राहील....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि होऊ शकते. नियंत्रण...Read More\n\"आपल्या प्रयत्नाने उन्नति कराल. धनलाभ होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. आपल्या प्रयत्नांमुळे व्यापारात वृद्धि होईल. नवीन कामांना चालना मिळेल. आपल्या यशाचा...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/reduction-of-any-desire/", "date_download": "2018-08-18T09:09:54Z", "digest": "sha1:Z6VZUJ3FJ6SOTQVUVGAOOBLHRRH6UFIR", "length": 5136, "nlines": 139, "source_domain": "www.marathimati.net", "title": "कुठल्याही वासनेचा | Reduction Of Any Desire", "raw_content": "\nकुठल्याही वासनेचा क्षय करायला प्रचंड धैर्य व संयमाची गरज लागते.\nया वर्गातील आणखी काही लेख\nवासना व अहंकाराचा नाश\nपरमेश्वरच सगळे करवून घेतो\nज्याने मनाला जिंकले त्याने\nThis entry was posted in सुविचार and tagged धैर्य, वासना, संयम, सुविचार on जुन 20, 2011 by विराज काटदरे.\n← २० जून दिनविशेष जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तिची →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://dateycollege.in/teachers-day/", "date_download": "2018-08-18T08:15:30Z", "digest": "sha1:2WW7ZEFQH52FRFHS5ERHHFYHP5YZ4ZAR", "length": 2686, "nlines": 45, "source_domain": "dateycollege.in", "title": "Teachers' Day - बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ", "raw_content": "बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ\n(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित )\nडॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन ५ सप्टेम्बर हा भारतात शिक्षक दिन म्हणुन साजरा केला जातो. विशुध्द विद्यालय संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी बाबाजी दाते यांचाही जन्मदिन ५ सप्टेम्बर हाच आहे. बाबाजींनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी वेचले.\nसंस्कारयुक्त शिक्षण हे त्यांचे ध्येय होते. म्हणुन या वर्षी शिक्षक दिन व श्रध्देय बाबाजी दाते जयंती समारोह हा दाते बी. पी. एड. कॉलेजच्या प्रांगणात साजरा झाला. सर्व संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी संस्थेच्या वयोजेष्ठ शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.\nCopyright © 2018 बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/218/Tuzya-Kantisam-Raktapataka.php", "date_download": "2018-08-18T08:38:44Z", "digest": "sha1:YRMBZTIZCKQ5OWFBYOYO4VY45E77T5HB", "length": 10829, "nlines": 149, "source_domain": "www.gadima.com", "title": "Tuzya Kantisam Raktapataka -: तुझ्या कांतिसम रक्‍तपताका : BhaktiGeete (Ga.Di.Madgulkar|Suman Kalyanpur|Snehal Bhatkar) | Marathi Song", "raw_content": "\nज्ञानियाचा वा तुक्याचा,तोच माझा वंश आहे\nमाझिया रक्तात थोडा,ईश्वराचा अंश आहे\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nचित्रपट: अन्‍नपूर्णा Film: Annapurna\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nतुझ्या कांतिसम रक्‍तपताका पूर्वदिशी फडकती\nअरुण उगवला, प्रभात झाली, ऊठ महागणपती\nसूर्याआधी दर्शन घ्यावे तुझे मूषकध्वजा\nसुभद सुमंगल सर्वाआधी तुझी पाद्यपूजा\nछेडुनि वीणा जागविते तुज सरस्वती भगवती\nआवडती तुज म्हणुनि आणिली रक्‍तवर्ण कमळे\nपांचमण्याच्या किरणांसम ही हिरवी दुर्वादळे\nउभ्या ठाकल्या चवदा विद्या घेउनिया आरती\nशुर्पकर्णका, ऊठ गजमुखा, उठी रे मोरेश्वरा\nतिन्ही जगांचा तुच नियंता, विश्वासी आसरा\nतुझ्या दर्शना अधीर देवा हर, ब्रम्हा, श्रीपती\nकविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)\nमहाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.\nउघडले एक चंदनी दार\nविठ्ठला तू वेडा कुंभार\nविठ्ठलाच्या पायी थरारली वीट\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://m4marathi.com/v2/facial-tips-marathi-language/", "date_download": "2018-08-18T09:05:38Z", "digest": "sha1:CRALER5ZAAN67IKNP6VOHPMTJLRTFAGJ", "length": 4670, "nlines": 61, "source_domain": "m4marathi.com", "title": "फेशियल : सौंदर्यसाधना : Facial Tips In Marathi : M4marathi | m4marathi", "raw_content": "\nफेशियल करण्याआधी ते केव्हा , कधी व कोणत्या वयापासून करावे हा प्रत्येक स्त्रियांना पडणारा प्रश्न आहे . वेगवेगळ्या सौंदर्यतज्ञांना या संदर्भात विचार\nणा केली असता काही निष्कर्ष मिळाले . साधारण जन्माला आल्यापासून म्हणजेच वयाच्या ० शून्यव्या वर्षापासून ते १२ व्या वर्षापर्यंत स्कीन मृदू व मुलायम असते . १२ व्या वर्षापासून शरीरात बदल होतात . ते हार्मोनल चेंजेस असतात . पण मुळे , मुली या वयात जाहिरातींच्या विळख्यात येऊन भुलून प्रत्येक क्रीम व इतर कॉस्मेटिक्स वापरतात . यामुळे त्वचेचे नुकसान होते . फक्त क्लिन्झिंग व टोनिंगची या वयात गरज असते . रोज झोपताना कापसाने क्लिन्झिंग मिल्क वापरून चेहरा पुसावा . म्हणजे दिवसभरातील चेहऱ्याला लागलेली धूळधाण निघून जाते . अंघोळीनंतर टोनिंग करावे . हातावर किंवा कापसावर घेऊन सर्व चेहऱ्याला लावावे . म्हणजे धूळ / प्रदुषणापासून चेहरा वाचेल .\n२/३ महिन्यांनी पार्लरमधून फेशियल व इतर सौंदर्य उपचार केले तरी घरी रोजच्या रोज पूर्ण शरीराची काळजी घ्यावी . घरगुती Packs , स्वयंपाक घरातील फळे , भाज्या , धान्यांची पीठे यांची मदत यासाठी होते . घरच्या घरी फेशियल करण्यासाठी प्रथम फेशियल करण्याच्या खास बाबी समजून घ्याव्यात .\nडोळे स्वच्छ व चमकदार राहण्यासाठी काही खास गोष्टी\nहिर्‍याचे दागिने घ्या पारखून .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A4%BE", "date_download": "2018-08-18T08:59:25Z", "digest": "sha1:PSLWG2L7RHS4F4YZRXVNDDKVUG26NQ4L", "length": 8536, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इरिट्रियन नाक्फा - विकिपीडिया", "raw_content": "\nआयएसओ ४२१७ कोड ERN\nनाणी १,५,१०,२५,५० सेंट १ नाक्फा\nबँक बँक ऑफ इरिट्रिया\nविनिमय दरः १ २\nनाक्फा हे इरिट्रियाचे अधिकृत चलन आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअल्जीरियन दिनार · इजिप्शियन पाऊंड · युरो (स्पेन नियंत्रित उत्तर आफ्रिका) · लिबियाई दिनार · मोरोक्कन दिरहाम · मॉरिटानियन उगिया · सुदानीझ पाउंड · ट्युनिसियन दिनार\nअँगोलन क्वांझा · बुरुंडीयन फ्रँक · मध्य आफ्रिकन सीएफए फ्रँक · काँगो फ्रँक · रवांडन फ्रँक\nकोमोरियन फ्रँक · जिबूतीयन फ्रँक · इरिट्रियन नाक्फा · इथियोपियन बिर्र · केनियन शिलिंग · सेशेल्स रुपया · सोमाली शिलिंग · दक्षिण सुदानीझ पाउंड · टांझानियन शिलिंग · युगांडन शिलिंग\nबोट्सवाना पुला · लेसोथो लोटी · ब्रिटिश पाउंड · मालागासी एरियरी · मालावियन क्वाचा · मॉरिशियन रुपया · मोझांबिक मेटिकल · नामिबियन डॉलर · सेंट हेलेना पाउंड · दक्षिण आफ्रिकन रँड · अमेरिकन डॉलर · स्वाझी लिलांगेनी · झांबियन क्वाचा · झिंबाब्वे डॉलर\nकेप व्हर्दे एस्कुदो · गांबियन डालासी · घाना सेडी · गिनियन फ्रँक · लायबेरियन डॉलर · नायजेरियन नाइरा · साओ टोमे आणि प्रिन्सिप डोब्रा · सियेरा लिओनन लिओन · पश्चिम आफ्रिकन सीएफए फ्रँक ·\nसध्याचा इरिट्रियन नाक्फाचा विनिमय दर\nगूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयाहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nएक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/main/index.php", "date_download": "2018-08-18T08:38:24Z", "digest": "sha1:TJWDZ6IDX3R6UDC5N5QHZ7CDXHKPS3HC", "length": 15552, "nlines": 248, "source_domain": "www.gadima.com", "title": "Marathi Songs | G D Madgulkar | Gadima | ग. दि. माडगूळकर | गदिमा | मराठी गाणी | Gani | Geete | GeetRamayan", "raw_content": "\nपद्मासमान जन्मे हे काव्य जीवनी या या जीवनात काव्ये, काव्यात जीवने या\nएका तळ्यात होती बदके पिले सुरेख...\nया कोकणात आता येणार रेलगाडी\nचांदोबा चांदोबा भागलास का\nश्रावण आला ग वनी\nतुझ्या ऊसाला लागल कोल्हा\nविनोदी किस्से | Vinodi Kisse\nगदिमा,शरदराव पवार व पी.सावळाराम यांचा किस्सा\nरातभर रहियो.. सबेरे चले जयियो..\nपुल,गदिमा व शरद पवार यांचा किस्सा\nबाई मी विकत घेतला श्याम\nमाझं ठरल्यालं लगीन मोडलं ग\nदेवा दया तुझी की\nआसावल्या मनाला माझाच राग येतो\nत्याचं मानूस हे नाव\nअजुन सजणा मी धाकटी\nअसा कसा देवा घरचा\nमी तर आहे मस्त कलंदर\nचांदोबा चांदोबा भागलास का\nगोरी गोरीपान फुलासारखी छान\nनाच रे मोरा नाच\nएका तळ्यात होती १\nजय जय जी बजरंग\nनवल वर्तले गे माये\nतुझे रूप चित्ती राहो\nकर्म करिता ते निष्काम\nअसेल कोठे रुतला काटा\nमाघ मास पडली थंडी\nबुगडि माझी सांडलि ग\nवेदमंत्राहून आम्हां वंद्य वंदे मातरम्‌\nराजा तिथे उभा असणार\nलढा वीर हो लढा लढा\nझडल्या भेरी झडतो डंका\nरघूवीर आज घरी येणार\nसुखद या सौख्याहुनि वनवास\nज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा\nहीच ती रामांची स्वामिनी\nनको रे जाउं रामराया\nमहाराष्ट्राच्या लोकजीवनात सुगंधासारखा शिरलेला एक प्रतिभासंपन्न साहित्यिक,कलाकार,मराठी माणूस ज्यांना 'गदिमा' या लाडक्या नावाने ओळखतो,जवळच्या मित्रांचे 'अण्णा' तर आम्हा नातवंडांचे 'पपा आजोबा' अर्थातच गीतरामायणकार महाकवी ग.दि.माडगूळकर\nगदिमांबद्ल लिहायचे म्हंटले तर अनेक पाने सुध्दा पुरणार नाहीत असे अष्टपैलू व्यक्तीमत्व, \"ज्योतीने तेजाची आरती\" या उक्ती नुसार वरवर त्यांच्या कार्याचा फक्त आढावा घ्यायचा झाला तर...\nगदिमांचा जन्म 'शेटफळे' या त्यांच्या आजोळी झाला तर बालपण अत्यंत गरीब व प्रतिकूल परिस्थिती मध्ये 'माडगुळे' या गावात गेले.गदिमांचे वडिल औंध संस्थानात कारकून होते,वयाच्या १६-१७ वर्षीं त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला सुरवातीला 'ब्रम्हचारी','ब्रँडीची बाटली' सारख्या काही चित्रपटात सहाय्यक नटाच्या (Extra Artist) भूमिका केल्या.भक्त दामाजी (१९४२) व पहिला पाळणा (१९४२) चित्रपटात त्यांना प्रथम गीतलेखनाची संधी मिळाली,लोकशाहीर रामजोशी(१९४७) चित्रपटापासून खर्‍या अर्थाने 'कथा,पटकथा,संवाद,गीते ग.दि.माडगूळकर' असा ब्रॅंड निर्माण झाला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत 'अनभिषक्त सम्राटपद' निर्माण केले.मराठी चित्रपटात 'कथाकार', 'पटकथाकार', 'संवादलेखक', 'गीतकार', 'अभिनेता','निर्माता' अशा सर्व क्षेत्रात त्यांनी वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये 'रामजोशी','वंदे मातरम,'पुढचे पाऊल','गुळाचा गणपती','लाखाची गोष्ट','पेडगावचे शहाणे','ऊनपाऊस','सुवासिनी','जगाच्या पाठीवर','प्रपंच', 'मुंबईचा जावई','देवबाप्पा' सारख्या उत्तमोत्तम चित्रपटांचा समावेश होता,गदिमा-सुधीर फडके-राजा परांजपे या त्रयीने तर मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ निर्माण केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.manashakti.org/index.php?q=story/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2018-08-18T09:21:27Z", "digest": "sha1:VVDS5GK3YHE7NW7HXINMC4UW6CIUPJZW", "length": 5279, "nlines": 92, "source_domain": "www.manashakti.org", "title": "शेवटचा सवाल | Manashakti Research Centre", "raw_content": "\nयेथे सातत्यपूर्ण मनःशांती मिळवण्याच्या सोप्या व व्यावहारीक उपायांची माहिती आहे.\nती अखेरची संध्याकाळ होती.\nमहंमद पैगंबर साहेबांच्या आयुष्यातील संध्याकाळचा असा अखेरचा नमाज होता. देवकार्य संपल्याची, आपल्या हातून पुरे झाल्याची जाणीव पैगंबर साहेबांना होती. ऐकणाऱ्यांना ती नव्हती. पण आपल्या प्राणप्रिय नेत्यावर आलेली गंभीरतेची छटा नकळतच त्या अफाट समुदायावर पसरली.\nजसा काही अखेरचा उपदेश आणि निरवानिरव करावी, असा पैगंबर साहेबांच्या बोलण्याचा थाट होता.\nहात उंच करून त्यांनी मोठ्या आवाजात विचारले, “एक प्रश्र्न आहे. मी कोणाचे काही देणे लागतो का\n ज्यांच्या शब्दासाठी करोडो दिनार, करोडो नाणी खर्च झाली तर स्वत:चे पुण्य घडले, असे मानणारे मातब्बर समोर होते. तेव्हा अशा प्रश्र्नासमोर कोण घेणेकरी उभा राहणार पण महंमदांनी पिच्छा पुरवला. त्यांनी पुन्हा अधिक मोठ्या आवाजात विचारले, “खरा जबाब द्या. मी कोणाचे काही देणे लागतो का”\nमागल्या रांगेतून एक माणूस लटपट उठला. म्हणाला, “त्या दिवशी कोपऱ्यावरच्या गरीबाला देण्यासाठी एक फादेम तुम्ही माझ्याकडून मागून घेतला होता. “\nत्या बोलक्या तोंडाला बंद करण्यासाठी, त्याला खाली खेचण्यासाठी शेजारी उठले. पैगंबर साहेबांनी त्यांना ताबडतोब बसण्याची खूण केली. जवळचे नाणे त्या समोरच्या वक्त्याकडे पोहोचवले. आणि आजूबाजूच्यांना ते म्हणाले, “वर गेल्यावर मान खाली घालण्याचा प्रसंग येण्यापेक्षा इथेच तो आलेला बरा. “\nहिशेब चुकता करून जाण्याची ज्ञात्यांची ही धडपड अपूर्व असते. स्वार्थासाठी येथे चुकवलेला प्रत्येक पैसा अखेर सोन्याच्या ताटाची परतफेड मागतो.\nदेवाची दुर्बिण पापाचा कणही पाहू शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://granthali.com/product/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%88%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A4-eka-unhachi-kaifiyat/", "date_download": "2018-08-18T08:37:55Z", "digest": "sha1:ISJWTQFCBI5QFR3F6VEQYWXYINBFP57G", "length": 5166, "nlines": 163, "source_domain": "granthali.com", "title": "एका उन्हाची कैफियत (Eka Unhachi Kaifiyat) | Granthali", "raw_content": "\nHome / कवितासंग्रह / एका उन्हाची कैफियत (Eka Unhachi Kaifiyat)\nशहर आत्महत्या करायचं म्हणतंय...\nसूर्य होता रात्रीला ₹500.00 ₹300.00\nअपेक्षा, निरीक्षण आणि निष्कर्ष अशा तीन अवस्थांतून सानेकरांचा काव्यानुभव जात असतो. सानेकर आपल्या काळाबरोबर आहेत. त्यांची गझल या गदारोळाच्या काळातील दु:खाची निर्मिती आहे. भविष्याचाही सावध विचार ते करत आहेत; त्यामुळे एकविसाव्या शतकाच्या पूर्वाधीचे ते एक ठळक मराठी गझलकार ठरणार आहेत. गझल ही सानेकरांची प्रयोगशाळा आहे.\nकवितेच्या कविता (Kavitechya Kavita)\nबाईच्या कविता (Baichya Kavita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%9F-%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95/", "date_download": "2018-08-18T08:01:22Z", "digest": "sha1:KX75462IRVPVZIYTJLF4IVSF6OX4YJLA", "length": 11817, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#अबाऊट टर्न : करमणूक..? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#अबाऊट टर्न : करमणूक..\nअन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण याप्रमाणे करमणूक हीसुद्धा एक महत्त्वाची गरज. जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक काळात माणसानं आपल्या करमणुकीसाठी वेगवेगळी साधनं शोधून काढल्याचं दिसतं. करमणुकीचा संबंध मनाच्या समाधानाशी असतो. किंबहुना तसा तो असावा, हे अपेक्षित आहे. याखेरीज ज्ञानवर्धन, जाणीवजागृती, वास्तवाचं भान असे हेतू करमणुकीच्या माध्यमातून पूर्ण झाल्यास ते अधिक फलदायी ठरतं. फार पूर्वीपासून माणसानं बैठ्या खेळांपासून करमणुकीची अनेक साधनं शोधून काढल्याचं इतिहास सांगतो.\nतिथपासून आजच्या इंटरनेट युगापर्यंत ही साधनं जशी बदलत गेली, तशाच माणसाच्या अपेक्षाही बदलत गेल्या. आज अभिव्यक्तीची अनेक माध्यमं आपल्या हातात असल्यामुळं दुसऱ्याची कला पाहण्याऐवजी आपली कला जास्तीत जास्त लोकांनी पाहावी, असं अनेकांना वाटू लागलंय. “एन्टरटेन्मेन्ट’ हा शब्द आजकाल “एक्‍साइटमेन्ट’चा समानार्थी शब्द म्हणून वापरला जाऊ लागलाय. कलाकार त्यामुळं “कल्लाकार’ बनलेत आणि त्यांचा “कल्ला’ आपल्याला कला म्हणून नाइलाजानं पाहावा लागतोय. तेही एकवेळ सहन करता आलं असतं. परंतु करमणुकीची साधनं प्रचंड संख्येनं उपलब्ध असूनसुद्धा अनेकांच्या मनाला समाधान मिळत नाही, ही परिस्थिती गंभीर आहे. हे समाधान वेगवेगळ्या चॅलेंजेसमध्ये शोधण्याची जीवघेणी स्पर्धा सुरू झालीय आणि हे विश्‍व नॉर्मल माणसाच्या आकलनापलीकडचं आहे.\nकीकी चॅलेंज नावाचा वेडगळ प्रकार परदेशांतून भारतात घुसण्याच्या तयारीत आहे आणि असल्या करामती कराल तर कारवाई करू, असा इशारा पोलिसांना द्यावा लागलाय. विशेषतः मुंबईत हे फॅड सुरू होण्याची भीती पोलिसांना वाटतीय. चालत्या गाडीतून खाली उतरायचं. दरवाजा उघडाच ठेवायचा. आत मोबाइल कॅमेरा सुरू असतो. गाडीतल्या डेकवर सुरू असलेल्या गाण्याच्या तालावर रस्त्यातच नाचायला सुरुवात करायची. मग चालत्या गाडीत चढायचं. डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करायचा आणि जास्तीत जास्त लाइक्‍स मिळवायचे, असं हे चॅलेंज. ज्यांच्याकडे सगळं आहे, कशालाच तोटा नाही, अशांची ही तऱ्हा, तर सामान्य घरातली पोरं लोकलमध्ये स्टंट करतायत. धावत्या लोकलच्या दरवाज्याला लटकून ही मंडळी आता थांबत नाहीत, तर टपावर चढण्याचा प्रयत्न करू लागलीत. त्याचे व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करतायत.\nपावसाळी पर्यटनाच्या हंगामात धबधबे आणि कड्यांवर उभं राहून सेल्फी काढणं, फेसबुक लाइव्हसाठी व्हिडिओ करणं, त्यासाठी एका हातात मोबाइल घेऊन त्यात आपली छबी न्याहाळत धोक्‍याकडे पाठ करून कुठेतरी लटकणं ही “करमणूक’ असेल तर प्रश्‍नच मिटला परंतु “ऍडव्हेंचर’ ही पूर्णपणे स्वतंत्र गोष्ट असून, त्यासाठी शास्त्रोक्त प्रशिक्षणाची गरज असते आणि ते देणाऱ्या संस्था भरपूर आहेत, हे जाताजाता सांगायला हरकत नाही.\nकरमणुकीचं रोज एक नवं फॅड मार्केटमध्ये येत असून, त्यामुळं पोरंबाळं घराबाहेर पडताना पालकांच्या छातीत धडकी भरणारच. नव्याचा स्वीकार हे प्रगतीचं लक्षण, यात दुमत नाही. परंतु या प्रक्रियेत अक्कल गहाण टाकली जात असेल तर हस्तक्षेप हवाच. पोकेमॉन गो आणि ब्लू व्हेलनं असाच उच्छाद मांडला होता. आता कीकीची धास्ती आपल्या गेममुळं आत्महत्या करणारे लोक हा पृथ्वीवरचा “जैविक कचरा’ आहे, हे ब्लू व्हेलच्या निर्मात्याचं कोर्टातलं भाष्य विचारात घ्यायला हरकत नसावी\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमॅन्चेस्टरमध्ये वृद्धिमान साहावर झाली शस्त्रक्रिया\nNext article‘अश्या’प्रकारे विराटने साजरा केला शतकाचा आनंद\n#चर्चा: राजकीय पक्ष घराणेशाहीच्या पलीकडे कधी जाणार\n#विविधा: पंडित विष्णू दिगंबर पलुसकर\n#दृष्टिक्षेप: बांगलादेशात वैचारिक स्वातंत्र्याची मुस्कटदाबी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/school-outfit-search-grant-pune-municipal-corporation-department-of-education-purchsing/", "date_download": "2018-08-18T08:01:24Z", "digest": "sha1:SAHEBUM6QUN4UPXT3DJIUN2PKAUQYPAY", "length": 9018, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आता शालेय साहित्याची झडती | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआता शालेय साहित्याची झडती\nअनुदान जमा केल्यानंतर खरेदी केल्याची शहानिशा\nमहापालिका शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय\nपुणे – शालेय साहित्य अनुदान मुलांच्या खात्यात जमा केल्यानंतर आता पालकांनी ही खरेदी केली, की नाही याची तपासणी केली जाणार आहे. पैसे जमा करून महिना झाला तरी अजूनही अनेक मुलाच्या पालकांकडून साहित्य खरेदी करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.\nप्राथमिक विभागाच्या सुमारे 83 हजार 620 मुलाच्या बॅंक खात्यात शैक्षणिक साहित्याची डीबीटी अर्थात डायरेक्‍ट बेनिफिशरी ट्रान्सफर योजनेद्वारे ही रक्कम जमा करण्यात आली आहे. तर उर्वरित 4 हजार मुलांची खाती काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.\nयाबाबत शिक्षण विभाग प्रमुख शिवाजी दौंडकर म्हणाले, जमा केल्या जाणाऱ्या अनुदानात गणवेशापासून सर्व शालेय साहित्याची रक्कम बाजार दरानुसार देण्यात आली आहे. ही रक्कम जूनपासून जमा करण्यात येत आहे. प्राथमिक विभागाकडे 92 हजार 144 मुले आहेत. यातील 83 हजार 620 मुलांची बॅंक खाती असून त्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे. तर उर्वरित 8 हजार 542 मुलांची खाती काढण्याचे काम सुरू असून त्यातील 3 हजार 807 मुले शाळेत येत नाहीत. त्यामुळे बॅंक खाती काढण्यात आलेल्या नसलेल्या मुलाची संख्या 4 हजार 735 आहे. ही रक्कम मुलाच्या खात्यात जमा करण्यासाठी 31 जुलैची मुदत निश्‍चित केली होती. हे काम जवळपास 95 टक्के पूर्ण झाले आहे.\nपाहिल्या दीड महिन्यात अनुदानाची रक्कम जमा केल्यानंतर आता साहित्य खरेदी केली की नाही याची तपासणी ऑगस्ट महिना केली जाणार आहे. पालकांनी साहित्य घेऊन त्याच्या पावत्या मुख्याध्यापकाकडे जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, पालकांनी प्रतिसाद दिलेला नाही. तसेच साहित्याबाबत अजूनही पालक गोंधळलेले आहेत. त्याबद्दल शाळेकडे विचारणा केली जात आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांना सूचना दिल्या असून साहित्य खरेदी तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\n– शिवाजी दौंडकर, शिक्षण विभाग प्रमुख, मनपा.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअडचणीत आलेल्या जहाजातील 343 जणांची मदत\nNext articleहिंसाचाराला ‘एल्गार परिषद’ हा ठोस पुरावा नाही\nसारथी उपक्रमातून 5 लाख लोकांचे शंका निरसन\nपुणे – दोनशेहून अधिक जणांकडून दावे दाखल\n“भुक मुक्त’ पुण्यासाठी स्मार्ट सिटीचा पुढाकार\nकचरा प्रकल्पांची क्षमता वाढवा\n24 तासांमध्ये मिळणार वीजग्राहकांना संपूर्ण माहिती\nअजित पवार यांनी घेतला जिल्हा परिषदेच्या कारभाराचा आढावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/celebrities/bhushan-patil", "date_download": "2018-08-18T08:17:58Z", "digest": "sha1:TW74BVDZMPWZYRSU7LVALGUMMV6NNCDA", "length": 2025, "nlines": 43, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Bhushan Patil | Marathi Dhamaal", "raw_content": "\nजो़डीदाराचे नाव: ग्रेस नोरोन्हा\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation स्वप्ना वाघमारेसोबत जॉन अब्राहम मराठी चित्रपट करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/maratha-morcha-9-augest-pune/", "date_download": "2018-08-18T08:01:40Z", "digest": "sha1:45VFG6ZKNNIRKFS3X3EQZZU4UPPZJXY6", "length": 8677, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मंचरमध्ये जिजाऊ वंदनेने मराठा मोर्चाला सुरुवात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमंचरमध्ये जिजाऊ वंदनेने मराठा मोर्चाला सुरुवात\nमंचर: 9 ऑगस्ट या क्रांती दिनी आंबेगाव तालुका बंद ठेवून जनआंदोलनाचा निर्णय मराठा समाजाने घेतला आहे. शाळा, शासकीय कार्यालये आणि व्यावसायिक दुकानदार यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असून, बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले, अशी माहिती संयोजक समन्वयक राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे राज्य संस्थापक अध्यक्ष ऍड. सुनील बांगर यांनी दिली.\nगुरुवारी (दि. 9) मराठा क्रांती मोर्चाची सकाळी साडेदहा वाजता मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून जिजाऊ वंदनेने सुरुवात होईल. मोर्चाच्या अग्रभागी छत्रपती शिवाजी महाराजांचे, जिजाऊसाहेब आणि मावळ्यांची वेषभुषा परिधान केलेले देखावे आणि त्यानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनी, महिला आणि त्यानंतर नागरिक या क्रमाने सामिल होऊन रॅली लक्ष्मी रस्त्याने छत्रपती शिवाजी चौकात येवून ऍड. सुनील बांगर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजाचे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील.\nत्यानंतर रॅली घोडेगाव रस्त्याने बाजारपेठमार्गे छत्रपती संभाजी चौकातून छत्रपती शिवाजी चौकात दिवसभर ठिय्या मांडतील. मोर्चे कऱ्यांच्यासमोर शाहीर पवार, टेमकर, थोरात यांचे शिवशाहीरीचे कार्यक्रम होतील. मोर्च्यांची सांगता विद्यार्थिनींची भाषणे आजण मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख संयोजक ऍड. सुनील बांगर यांचे संदेशात्मक मार्गदर्शन होईल.\nयानंतर शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल. मोर्चा शांततेने होणार असून यामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. तसेच घोडेगाव बार असोशिएशनने मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवला असल्याचे असोशिएशनचे अध्यक्ष सुरेश टाके, उपाध्यक्ष मुकुंद वळसे पाटील, अनिल पोखरकर आणि सचिव नीलेश शेळके यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरोजगारनिर्मिती वाढण्यास प्रचंड वाव\nNext articleआळंदीत वर्षभरात केवळ सहाच जोडप्यांची विवाह नोंदणी\nरिक्षाचालकांचे प्रश्‍न मार्गी लावणार -पालकमंत्री गिरीश बापट\nकारागृहातील कैद्यांना विशेष माफी मिळणार ; केंद्र सरकारचा निर्णय \nबारामतीत पहिले पाढे पंच्चावन्न \nखासदार सुळेंनी धरला झिम्मा फुगड्यांचा फेर\nमातृभाषांची जपणूक करणे प्रत्येकाचे कर्तव्य- राज्यपाल सी. विद्यासागर राव\nदुर्मीळ वृक्षांची अनोखी दिंडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://sanvaad.blogspot.com/2010/06/blog-post.html", "date_download": "2018-08-18T08:36:31Z", "digest": "sha1:MSKYXDWRL2V4EHAULDEOKVMIT3ETHNJW", "length": 8235, "nlines": 120, "source_domain": "sanvaad.blogspot.com", "title": "संवाद: पुस्तक परिचय: बापलेकी", "raw_content": "\nमाझ्या मनातला सातत्याने चाललेला विचारांचा प्रवास...माझ्यातल्या चाकोरीबाहेरच्या नव्या जाणिवा, नव्या सृजनाची जाण...त्याची अभिव्यक्ति म्हणजेच हा संवाद...मर्मबंधातली ठेव ही\nबाप आणि लेक. हे नातं मूलभूत आणि महत्वाचं तर खरच, पण माय -लेकीच्या नात्याइतकं महत्व ह्या नात्याला अजूनही मिळालेलं दिसत नाही. माय - लेक ह्या नात्याच्या उल्लेखातूनही जवळीकीचे जे संदर्भ मनात उमटत जातात, तसे बाप - ले़क ह्या नात्याच्या उल्लेखातून मात्र सहसा उमटत नाहीत. लेकीची सुरुवातीची, लहानपणाची काही वर्षं सोडली तर, मनात माया असली तरी, शिस्त, थोडासा दुरावा आणि परस्पर नात्यामधली एक अदृश्य लक्ष्मणरेखा हे संचित काही ह्या नात्याला टाळता येत नाही. मनात अमाप माया ओसंडून जात असली तरी, ती आईसारखी उघडपणे लेकीवर उधळता येत नाही.\n लेकीच्या मानसिक जडण घडणीत, व्यक्तिमत्त्व विकासात, संगोपनात आणि एकूणच आयुष्यात बापाची भूमिका काय जसं लेक मोठी होता होता, मायलेकीच्या नात्यामधे सहसा मैत्रीचे धागेही गुंफले जातात, तश्या धाग्यांची वीण बाप लेकीमध्ये गुंफली जाऊ शकते का जसं लेक मोठी होता होता, मायलेकीच्या नात्यामधे सहसा मैत्रीचे धागेही गुंफले जातात, तश्या धाग्यांची वीण बाप लेकीमध्ये गुंफली जाऊ शकते का गुंफायला हवी की नको गुंफायला हवी की नको ह्या प्रक्रियेला थोपवण्यासाठी अडसर उभे असतात का ह्या प्रक्रियेला थोपवण्यासाठी अडसर उभे असतात का असतील, तर कश्या प्रकारचे\nमुळात पुरुषाची अधिकार गाजवण्याची मानसिकता, समान पातळीवर उतरुन लेकीशी \"मैत्री\" साधू, जोडू शकते का मैत्रीच्या नात्यातलं कधी काळी उमटणारं अरे - कारेही पेलू शकते का\nअर्थात, प्रत्येक पिढीगणिक हे नातं बदलत आहे, हे तर नक्कीच.\nहेच बदल आणि वर उद्धृत केलेल्या व ह्या सारख्या इतर प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न बापलेकी ह्या पुस्तकातून केलेला दिसतो. पद्मजा फाटक, विद्या विद्वांस आणि दीपा गोवारीकर ह्यांनी संपादित केलेल्या ह्या पुस्तकांत काही लेकींनी आणि मोजक्या बापांनी अतिशय प्रामाणिकपणे आपापल्या नात्यांविषयी लिहिलेलं आहे. काही सुसंवादी आणि आल्हाददायक नातेसंबंधांविषयी वाचताना एक हृद्य भावना मनात दाटून येते, तेह्वा काही खुरटलेली, कोमेजलेली नाती समजून घेताना वाईटही तेवढंच वाटतं. जगी सर्व सुखी असा कोण आहे, हे मनात येऊन जातं...\nपुस्तकाच्या प्रस्तावनेत संपादिका विनंती करतात, तसं, रसिकांनी ह्या मनोगतांतली साम्यस्थळं आणि भेद, बलस्थान आणि भेद न्याहाळावेत, समजून घ्यावेत. त्याच्याशी शक्य असेल तसे, स्वतःचे अनुभव पडताळावेत आणि त्यातून आपल्या नात्यांच्या संदर्भचौकटींसाठी जे काही आधार मिळतील, कप्पे गवसतील, त्यांच खुल्या मनानं स्वागत करावं\nसंपादकः पद्मजा फाटक, विद्या विद्वांस आणि दीपा गोवारीकर\nकिंमतः रुपये ३५०/- (पाचवी आवृत्ती)\nLabels: पुस्तक परिचय, मला आवडलेले\nमाझिया मना जरा सांग ना\nप्रतिबिंब - आणि हा ब्लॉग बघणीय पण :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/govidyapitham/", "date_download": "2018-08-18T08:46:05Z", "digest": "sha1:UKHAGRAC7OKRGWYKOTNB34C4YJRRGPAD", "length": 8918, "nlines": 86, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Govidyapitham", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nगोविद्यापीठम्‌मधील ह्या दुधी भोपळ्यांचा आकार बघता, सेंद्रीय शेतीच्या आधारे काय साध्य होऊ शकते ह्याचा प्रत्यय येतो. ________________________________________________________________________________________________________ परसबाग हे मॉडेल तर शेतकरी त्याच्या अंगणातही करू शकतो, पण मुंबईसारख्या शहरात एका छोटयाश्या जागेत आपण शहरवासी सुद्धा हे मॉडेल उभारू शकतो इतके ते सोपे आहे. ________________________________________________________________________________________________________ गाईंच्या शेणापासून बायो गॅसचा यशस्वी प्रकल्पही गोविद्यापीठम्‌ येथे राबविला जात असून, ह्या बायो गॅसद्वारे संपूर्ण गोविद्यापीठम्‌मध्ये विद्युत पुरवठा करण्याची तरतूदही केली जाऊ शकते. ________________________________________________________________________________________________________ गाईंच्या शेणापासून\nगाय ही “कामधेनू” का आहे हे गायीच्या अनेक उपयोगांमधून लक्षात येते. गोमूत्र, गायीचे शेण, गूळ आणि इतर काही गोष्टी एकत्र करून “जीवामृत” हे अनोखे द्रव्य तयार केले जाते जे खरंच जमिनीकरता संजीवनी आहे. ________________________________________________________________________________________________________ A2 प्रकारचे अत्यंत पौष्टिक आणि उपयुक्त दूध देणाऱ्या गीर जातीच्या गाईंचे गोविद्यापीठम्‌ येथे संगोपन केले जाते. ________________________________________________________________________________________________________ कुक्कुटपालनाचा उपक्रम तर त्यांच्या खाद्यावर अक्षरशः नगण्य खर्च करीत राबविण्याची किमया AIGVने केली आहे. ________________________________________________________________________________________________________ ससेपालन, बटेरपालन सारख्या\n“अजोला” (Azolla Cultivation) सारख्या अनोख्या आणि अत्यंत कमी खर्चात होणाऱ्या प्रकल्पामधून, आवश्यक आणि पौष्टिक चारा अगदी नगण्य खर्चात कश्या प्रकारे तयार करावा ह्याचे प्रशिक्षण यशस्वी प्रयोगांसहित दिले जाते. ________________________________________________________________________________________________________ “अजोला” (Azolla Cultivation) सारख्या अनोख्या आणि अत्यंत कमी खर्चात होणाऱ्या प्रकल्पामधून, आवश्यक आणि पौष्टिक चारा अगदी नगण्य खर्चात कश्या प्रकारे तयार करावा ह्याचे प्रशिक्षण यशस्वी प्रयोगांसहित दिले जाते. ________________________________________________________________________________________________________ काहीही खर्च न करता एन-पी-के (N-P-K) पुरविणारे उपयुक्त खत कसे बनवावे,\nबापूंच्या संकल्पनेतून साकार झालेले गोविद्यापीठम्‌ व त्याच गोविद्यापीठम्‌ मध्ये चालणारे AIGVचे अफाट कार्य आज समस्त शेतकर्‍यांसाठी तसेच इतर श्रद्धावानांसाठीही प्रेरणादायी व कौतुकास्पद ठरत आहे. ____________________________________________________________________________________________________ वर्षानुवर्षे रासायनिक खतांचा मारा करून सोन्यासारख्या जमिनीची खर्‍या अर्थाने माती झालेली असताना, येत्या काळात सेंद्रिय शेतीच शेतकऱ्याला वरदान ठरणार आहे हे निर्विवाद सत्य आहे. ____________________________________________________________________________________________________ हायड्रोपोनिक्स तंत्रातून १ कि. मक्याच्या बियांपासून 8 ते 9 कि. चारा अवघ्या सात दिवसांत तयार करता येतो आणि तयार केलेला\nईरान मसले पर तनाव बढा\nत्रिविक्रमाची १८ वचने (मराठी)\nत्रिविक्रम के १८ वचन (हिन्दी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://news24live.in/", "date_download": "2018-08-18T08:57:11Z", "digest": "sha1:UHENDAEISE2G7CFOH43GUAMQUMUJVTMX", "length": 21562, "nlines": 206, "source_domain": "news24live.in", "title": "News 24 Live", "raw_content": "\n*”आठवलेंनी 25 लाख दिले तर आम्ही 26 लाख देऊ”,वामन मेश्राम यांनी केले जाहीर*\n*पुण्यातील शिवानी नाईक शहा प्रतिष्ठित मिसेस इंडिया “क्वीन ऑफ सब्स्टन्स 2018″ची विजेती*\n*पुण्यातल्या थॅलेसेमिया ग्रस्त मुलांना राउंड टेबल इंडियाकडून मदतीचा हात*\n*करिष्मा कपूर यांच्या हस्ते लोकप्रिय नीरूज्‌ स्टोअर चे उदघाटन*\n*अत्याधुनिक सुविधांसह सिल्व्हर बेसिस ग्रुपचा भारतात चाकण येथे विस्तार.*\n*”आठवलेंनी 25 लाख दिले तर आम्ही 26 लाख देऊ”,वामन मेश्राम यांनी केले जाहीर*\n*पुण्यातील शिवानी नाईक शहा प्रतिष्ठित मिसेस इंडिया “क्वीन ऑफ सब्स्टन्स 2018″ची विजेती*\n*पुण्यातल्या थॅलेसेमिया ग्रस्त मुलांना राउंड टेबल इंडियाकडून मदतीचा हात*\n*करिष्मा कपूर यांच्या हस्ते लोकप्रिय नीरूज्‌ स्टोअर चे उदघाटन*\n*राहुल गांधी का इंटरव्यू दिखाने वाले चैनलों पर होगी FIR, बीजेपी की शिकायत पर चुनाव आयोग ने दिया आदेश*\n*राजाभाऊ पोटे यांची अनोखी नागपंचमी… समाजाच्या एकत्रीकरणातून साधणार विकास…*\n*भारताचे 14 वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद …पूर्ण माहिती वाचा*\n*डिजीकोरच्या वर्च्युअल टेलीपोर्टेशनद्वारे अन्य स्थानावरील गोष्टींचा मागोवा घेणे झाले सोपे.*\n*पुण्यात बार्बेक्यू नेशनने सादर केले ‘रॉयल किचन्स ऑफ इंडिया’…*\nपुणे, news24live : भारतातील अग्रगण्य उपहारगृहांच्या साखळीतील एक असलेल्या बार्बेक्यू नेशनने पूर्वीच्या काळातील भारतीय संस्थानांचे खाद्यपदार्थ पुण्यात आणले आहेत. राजेशाही मुदपाकखान्यात\n*भारताचे 14 वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद …पूर्ण माहिती वाचा*\n*डिजीकोरच्या वर्च्युअल टेलीपोर्टेशनद्वारे अन्य स्थानावरील गोष्टींचा मागोवा घेणे झाले सोपे.*\n*ई-कार्डस प्राइवेट लिमिटेडचे इको-फ्रेंडली भारतीयकृत ऑनलाईन पोर्टल सुरू*\n*विख्यात लेखक फारूख शेख की ऍडव्हेंचार,ऍडव्हेंचर किताब विमोचित*\n*पुण्यातल्या थॅलेसेमिया ग्रस्त मुलांना राउंड टेबल इंडियाकडून मदतीचा हात*\nवंचित मुलांकरिता कार्य, राउंड टेबल इंटरनॅशनलचे अध्यक्ष यान टॅवेर्नीयर यांची उपस्थिती news24live : पुण्यातल्या थॅलेसेमिया ग्रस्त मुलांना राउंड टेबल इंडियाकडून\n*४३५ कर्णबधीर मुलांचा बिग इअर्सच्या मदतीने आवाजाच्या जगात प्रवेश… ग्रॅज्यूएटींग सोहळ्याला विक्रम गोखले मुख्य अतिथी म्हणून उपस्थित*\n*रेसिडेन्सी क्लबचे पुणे प्राईड अवॉर्ड्स संपन्न डॉ. बाबा कल्याणींच्या हस्ते सन्मान, सुमित्रा भावेंना जीवन गौरव पुरस्कार*\n*बाऊन्सर्स -बॉडीगार्ड के क्षेत्र का अग्रनीम नाम डी ए सर्व्हिसेस…व्हिडिओ*\n*पुण्यातल्या थॅलेसेमिया ग्रस्त मुलांना राउंड टेबल इंडियाकडून मदतीचा हात*\nवंचित मुलांकरिता कार्य, राउंड टेबल इंटरनॅशनलचे अध्यक्ष यान टॅवेर्नीयर यांची उपस्थिती news24live : पुण्यातल्या थॅलेसेमिया ग्रस्त मुलांना राउंड टेबल इंडियाकडून\n*बाऊन्सर्स -बॉडीगार्ड के क्षेत्र का अग्रनीम नाम डी ए सर्व्हिसेस…व्हिडिओ*\n*संचेती हॉस्पिटल मध्ये आता’डान्स मूव्हमेंट थेरपी’*\n*भारताचे 14 वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद …पूर्ण माहिती वाचा*\n*इस चिठ्ठी ने पहुचाया राम रहीम को चक्की पिसने…*\n*”आठवलेंनी 25 लाख दिले तर आम्ही 26 लाख देऊ”,वामन मेश्राम यांनी केले जाहीर*\n*6 महिन्यापूर्वी रामदास आठवले यांनी संपुर्ण महाराष्ट्राचे स्फुर्तीस्थान असलेल्या संभाजी सेवक वीर गोविंद गोपाळ यांच्या समाधीचा विकास करण्यासाठी 25 लाख\n*पुण्यातील शिवानी नाईक शहा प्रतिष्ठित मिसेस इंडिया “क्वीन ऑफ सब्स्टन्स 2018″ची विजेती*\nnews24live : पुण्यातील शिवानी नाईक शहा यांनी “मिसेस इंडिया क्वीन ऑफ सबस्टन्स 2018″ हे प्रतिष्ठित मुकुट जिंकले आहे. दिल्लीत नुकताच हा\n*पुण्यातल्या थॅलेसेमिया ग्रस्त मुलांना राउंड टेबल इंडियाकडून मदतीचा हात*\nवंचित मुलांकरिता कार्य, राउंड टेबल इंटरनॅशनलचे अध्यक्ष यान टॅवेर्नीयर यांची उपस्थिती news24live : पुण्यातल्या थॅलेसेमिया ग्रस्त मुलांना राउंड टेबल इंडियाकडून\n*करिष्मा कपूर यांच्या हस्ते लोकप्रिय नीरूज्‌ स्टोअर चे उदघाटन*\nnews24live : हैदराबाद आणि मुंबईमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर लोकप्रिय एथनिक ब्रॅन्ड नीरूज्‌ने पुणे शहरात आपल्या पहिल्या स्टोअर ची सुरूवात सेलेब्रिटी उद्‌घाटक करिष्मा कपूरच्या हस्ते फिनिक्स मार्केट सिटी, विमान नगर येथे केली. ह्या स्टोअरने ह्या सीझनमधील आकर्षक एथनिक वेअरट्रेंड्‌स दाखवले. ह्या लाँचच्या वेळेस नीरूज्‌ चे व्यवस्थापकीय संचालक श्री. अवनिश कुमार उपस्थित होते. नीरूज्‌ ह्या ब्रॅन्डने भारत भरात एथनिक फॅशनवेअरमधील नवीन उंची प्रस्थापित केली आहे. येथे प्रत्येक पोशाख हा सर्वोत्तम गुणवत्ता, उत्तम डिजाईन्स,शुद्ध फॅब्रिक्स, उजळ रंग, छान टेलरिंग आणि अभिनव आकार यांना लक्षात घेऊन बनवण्यात येतात. नीरूज्‌चे व्यवस्थापकीय संचालक श्री. अवनिश कुमार म्हणाले, “फिनिक्स मार्केट सिटी, विमान नगर, पुणे येथे नीरूज्‌च्या सुरूवातीची घोषणा करताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे. येथे आमचे २००० चौरस फूट\n*अत्याधुनिक सुविधांसह सिल्व्हर बेसिस ग्रुपचा भारतात चाकण येथे विस्तार.*\nnews24live : सिल्व्हर बेसिस हे ऑटोमोटिव्ह इंजेक्शन टूलींगमधील जगातील आघाडीचे नाव असून चाकण, पुणे येथे ते आपल्या नवीन अत्याधुनिक सुविधा सुरु\n*४३५ कर्णबधीर मुलांचा बिग इअर्सच्या मदतीने आवाजाच्या जगात प्रवेश… ग्रॅज्यूएटींग सोहळ्याला विक्रम गोखले मुख्य अतिथी म्हणून उपस्थित*\nपुणे, news24live: जन्मतःच मुकबधीर असणाऱ्या मुलांसाठी कॉकलीयर इम्प्लांट शस्त्रक्रिया केली जाते ज्याने कधीही आवाजाचा स्पर्श न झालेल्या मुलांना ऐकायला येऊ लागते.\n*क्रेझी बीचा पुण्यात विस्तार…झीओमी टेक्नोलॉजीस आणि शुनवेई कॅपिटलच्या मदतीने क्रेझी बीने जमा केला सुमारे ८ मिलिअन अमेरिकन डॉलरचा फंड*\nविद्यार्थ्यांचा अफाट प्रतिसाद पुणे, दि. २० डिसेंबर: विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणारे “क्रेझी बी” हे भारतातील सर्वात मोठे माइक्रो लेंडिंग व्यासपीठ आहे. बंगलोर, हैद्राबाद, तेलंगाना, आंध्रप्रदेश आणि वेल्लोर येथे क्रेझी बीच्या शाखा कार्यरत असूनवर्षाअखेरीस ११ अधिक शाखेचे प्रयोजन आहे. आत्तापर्यंत क्रेझी बीने ४ लाखापर्यंत विद्यार्थ्यांना मदत केली आहे. सध्या ३ हजारविद्यार्थ्यांच्या अर्जाचे काम सुरु असून दिवसाला १ हजार सातशे कर्जांचे वाटप केले जाते. क्रेझी बी फक्त पुण्यातच २०० विद्यापीठांचा भाग असून सुमारे २० हून अधिक विद्यार्थी प्रशिकषणार्थी आहे. पुण्यात मिळालेल्या अफाटप्रतिसादामुळे आम्ही मुबई, नाशिक आणि नागपूर येथे देखील आमचा विस्तार केला असे क्रेझी बीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारीअधिकारी मधुसूदन.ई एका कार्यक्रमात बोलले. झीओमी टेक्नोलॉजीस आणि शुनवेई कॅपिटलच्या मदतीने क्रेझी बीने समारे ८ मिलिअन अमेरिकन डॉलर उभारले आहे. आतापर्यंत क्रेझीबीने सुमारे १३ मिलिअन अमेरिकन डॉलरचा विलक्षण टप्पा गाठला आहे. क्रेझी बी फक्त शिक्षणापुरतेच मदत करत नसून विद्यार्थ्यांच्या अतिरिक्त आवश्यक खर्च जसे टू व्हीलर, इ कॉमर्स खर्च इ. देखील करते. News24live.in #update_urself\n*भव्य “शौर्यज्योत रॅली” चे आयोजन…कळंबी ते भीमा कोरेगाव रॅलीत 15 हजार लोक होणार सहभागी*\nपुणे news24live : कळंबी ते भीमा कोरेगाव वीर शिदनाक शौर्य ज्योत रॅलीचे 30 डिसे. 2017 ते 1 जाने. 2018 रोजी\n*वार्ताहराला मारहाण करून जबरदस्तीने माफीनामा घेतला…महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून आयुक्तांना निवेदन*\nपुणे news24live : मांजरी येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या वार्ताहराला सहायक पोलीस\n*”आठवलेंनी 25 लाख दिले तर आम्ही 26 लाख देऊ”,वामन मेश्राम यांनी केले जाहीर*\n*पुण्यातील शिवानी नाईक शहा प्रतिष्ठित मिसेस इंडिया “क्वीन ऑफ सब्स्टन्स 2018″ची विजेती*\n*पुण्यातल्या थॅलेसेमिया ग्रस्त मुलांना राउंड टेबल इंडियाकडून मदतीचा हात*\n*करिष्मा कपूर यांच्या हस्ते लोकप्रिय नीरूज्‌ स्टोअर चे उदघाटन*\n*अत्याधुनिक सुविधांसह सिल्व्हर बेसिस ग्रुपचा भारतात चाकण येथे विस्तार.*\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/district-collectors-order-disciplinary-action-against-bidao-130049", "date_download": "2018-08-18T08:50:44Z", "digest": "sha1:5QPHMDV7ISPQMXROLMGI6FSN6CBRJMH5", "length": 14708, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "District Collector's order for disciplinary action against Bidao बीडोओसह ग्रामसेवकावर शिस्तभंगाच्या कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश | eSakal", "raw_content": "\nबीडोओसह ग्रामसेवकावर शिस्तभंगाच्या कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश\nगुरुवार, 12 जुलै 2018\nयेवला - शौचालय नसल्याची खात्री न करताच शौचालय असल्याचे खोटे दाखले दिल्याच्या प्रकरणाने मातुलठाण येथील वातावरण चांगलेच तापले आहे. ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांना ग्रामसेवकाने दाखले दिल्याने तर गटविकास अधिकाऱ्यांनी विसंगत अहवाल दिल्याने या दोघांवर शिस्तभंगाच्या कार्यवाहीचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. मातुलठाण येथील राष्ट्रीय एकताचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब कातुरे यांनी उपसरपंच सीताराम केदार,\nयेवला - शौचालय नसल्याची खात्री न करताच शौचालय असल्याचे खोटे दाखले दिल्याच्या प्रकरणाने मातुलठाण येथील वातावरण चांगलेच तापले आहे. ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांना ग्रामसेवकाने दाखले दिल्याने तर गटविकास अधिकाऱ्यांनी विसंगत अहवाल दिल्याने या दोघांवर शिस्तभंगाच्या कार्यवाहीचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. मातुलठाण येथील राष्ट्रीय एकताचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब कातुरे यांनी उपसरपंच सीताराम केदार,\nसदस्य रामदास कातुरे, हिराबाई वाहुळ, वत्सला मोरे, नवनाथ नागरे या ५ ग्रामपंचायत सदस्यांकडे शौचालय आहे. किंवा नाही तसेच ज्या सदस्यांकडे शौचालय नसेल अशा सदस्यांवर कारवाही करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे २४ नोव्हेंबर २०१५ रोजी केली होती. त्यांचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणीही या अर्जात कातुरे यांनी केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ३० नोव्हेंबर २०१५ रोजी गटविकास अधिकारी सुनील आहिरे यांच्याकडे चौकशी करून चौकशीअंती दोषी आढळणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांवर कारवाई करून केलेल्या सर्व कार्यवाहीचा अहवाल मागविला होता. परंतु, सदर आदेश प्राप्त होऊनही गटविकास अधिकाऱ्यांनी कुठलेही तातडीचे पाऊल न उचलल्याने दोन वर्षानंतर १३ ऑक्टोबर २०१७ रोजी तक्रारदार कातुरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशीबाबत चालविलेल्या दिरंगाईबाबत पत्र दिले. यानंतरही गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी केली नाही म्हणून १६ ऑक्टोबरला गटविकास अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.\nयावर गटविकास अधिकाऱ्यांनी सदस्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन अहवाल सादर केला होता. यानंतर १५ जानेवारी रोजी पाचही सदस्यांकडे शौचालय नसल्याने यांनी या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करावे असा अहवाल जिल्हाधिकारयांना सादर केला आहे. मात्र पुन्हा ९ एप्रिलला या अहवालात पाचही सदस्यांकडे शौचालय असून वापरात असल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी सुरू असताना म्हटले आहे.\nगटविकास अधिकारी व ग्रामसेवकाने शहानिशा न करता विसंगत अहवाल दिल्याने प्रशासनाची दिशाभूल केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी.यांनी उप मुख्यकार्यकरी अधिकारी यांना सदर प्रकरणाबाबत सविस्तर चौकशी करून गटविकास अधिकारी व मातुलठाणच्या ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कार्यवाही तीन महिन्यांच्या आत करून अहवाल सादर करण्याचे आदेश ११ जून रोजी दिले आहेत.\nऔरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत...\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nड्रेनेज वाहिन्यांच्या सर्वेक्षणाची गरज\nपुणे - राजाराम पुलालगत असलेल्या डीपी रस्त्यावर खचलेल्या ड्रेनेजचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. जुनी वाहिनी खचली असून, वाहिन्यांची तपशीलवार माहितीच...\nभोकरदनमध्ये नदीत शेतकरी गेला वाहून\nकेदारखेडा (जि. जालना) - भोकरदन तालुक्‍यात गुरुवारी (ता. 16) झालेल्या पावसामुळे गिरिजा नदीला मोठ्या...\nपेंग्विनला पाहण्यासाठी चिमुकल्यांची झुंबड\nमुंबई - स्वातंत्र्यदिनी जन्मलेल्या देशातील पहिल्या पेंग्विनला पाहण्यासाठी राणीच्या बागेत शुक्रवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2018-08-18T09:05:27Z", "digest": "sha1:6M2PIF2YL2ASG3MCO36GKXKG6KJ2CHZP", "length": 4828, "nlines": 62, "source_domain": "m4marathi.com", "title": "दुर्गभ्रमंती- किल्ले \"राजगड\" | m4marathi", "raw_content": "\nशिवरायांनी गड किल्ल्यांवारती आपलं उभं आयुष्य व्यतीत केलं,स्वराज्याची पहिली राजधानी म्हणुन राजगडला ओळखलं जात.\nगडांचाराजा म्हणजे ‘राजगड’ होय. छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला म्हणजे ‘राजगड’. स्वत: महाराजांनी या गडाची उभारणी केली असून इ. स. १६४५ ते १६७२जवळजवळ २७ वर्षांचा कालखंड महाराजांनी गडावर घालविला होता. महाराजांची काहीकाळासाठी ‘राजगड’ ही राजधानी होती.\nअतिशय दुर्गम किल्ला म्हणूनआजही जागतिक स्तरावर ‘राजगडचा’ गौरव केला जातो. गडावर, संजीवनी माची, बालेकिल्ला, पद्मावती देऊळ, राजवाडा, मारुती मंदिर आदी महत्त्वाच्याऐतिहासिक वास्तू पाहण्यासारख्या आहेत. गडावरून निसर्गाच्या अकराळ-विकराळ पणतरीही सुंदर अशा स्वरूपाचे दर्शन होते. अतिशय देखणा पण चढण्यास अवघड असाहा किल्ला आहे. छत्रपती शिवाजीराजांनी मिर्झाराजे जयसिंगाशी जोतह केलाहोता, त्यामध्ये राजांनी २३ किल्ले मुघलांच्या स्वाधीन केले होते. त्यावेळी स्वराज्यात राहिलेल्या १२ किल्ल्यापैकी एक म्हणजे ‘राजगड’ हा प्रसिद्धकिल्ला होय. पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर हा किल्ला आहे. पुणेजिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात हा डोंगरी किल्ला असून, पुणे, भोर येथूनगडावर जाण्यासाठी गाड्या उपलब्ध आहेत.\n१४ वर्षांनी हुंडा परत केला, कारण……\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.swapnsrushti.com/", "date_download": "2018-08-18T08:13:21Z", "digest": "sha1:7I32ZCVCE4C7ZESBZTMJML6FI6UTMHP2", "length": 2204, "nlines": 48, "source_domain": "www.swapnsrushti.com", "title": "Swapnsrushti – Welcome to Swapnsrushti, Lanja.", "raw_content": "\n\"हक्काचं माझं गावाकडचं घर\" स्वप्नसृष्टी\nमित्रहो, आपल्याला हवंय अस गाव की जेथे मुंबई-पुण्याहून येण्यासाठी दणळवळणाची साधने मुबलक असतील, निसर्गाचे सान्निध्य असेल, शहरवजा गाव जवळ असेल आणि तेथे हॉस्पीटल्स, मेडीकल स्टोअर्स, भाजीपाला, मोठी डिपार्टमेंटल स्टोअर्स, राष्ट्रीयकृत बँका आणि त्यांची एटीएम्स असं सार सारं काही तेथे मिळू शकेल. आणि हाकेच्या अंतरावर दैनंदिन वस्तूही मिळतील.\nएकूण प्लॉट (फेज १)\nएकूण संभाव्य लोकवस्ती (फेज १)\nलांजा पासून अंतर (कि.मी.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8.php", "date_download": "2018-08-18T09:03:31Z", "digest": "sha1:Z7EAIQ3IHVIGDIU2U4PWKMQTSXFPP42X", "length": 78617, "nlines": 1230, "source_domain": "tarunbharat.org", "title": "संधीचे सोने अन सोन्याचा साधू! | Tarun Bharat", "raw_content": "\nवीर संघवी, ज्येष्ठ पत्रकार\nउजव्या विचारसरणीला एक मंच उपलब्ध होईल म्हणून पुद्दुचेरी साहित्य उत्सव रद्द करण्याची डाव्यांची मागणी विचित्र...\nप्रशांत उमराव, वकील, सर्वोच्च न्यायालय\nमेरठमध्ये हेलिकॉप्टरमधून शिवभक्त कावडियांवर फुलांचा वर्षाव करणारे मेरठ भागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांना...\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळात एकाच दिवशी शंभर बळी\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nआयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ\nअजित वाडेकर यांचे निधन\nकेरळमध्ये पावसाचे ७७ बळी; १८ हजार बेघर\nवीर संघवी, ज्येष्ठ पत्रकार\nAll अर्थ कृषी नागरी न्यायालय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nआयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ\nअजित वाडेकर यांचे निधन\nसीआरपीएफला सर्वाधिक शौर्य पदके\nमहाराष्ट्राला ५१ पोलिस पदके\nहवाई दल जवानाच्या वेषात अतिरेकी\nराजीव गांधींनीच नाकारला होता दलितांचा हक्क\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nरस्ता सुरक्षा विषय अभ्यासक्रमात असावा\nडिजिटल व्यवहारांवर २० टक्के कॅशबॅक\nघर, वाहनकर्ज महागले; व्याजदरात ०.२५ टक्क्यांची वाढ\nमहसूल वाढल्याने जीएसटी घटणार\nनिर्देशांक नव्या विक्रमी उच्चांकावर\n‘डिमांड ड्राफ्ट’च्या नियमात बदल\nडॉलरसमोर रुपया सक्षम, मोदी सरकार धैर्यवान\nदेशभर आज जीएसटी दिवस पाळणार\nआर्थिक सल्लागार भारतीय मूल्ये जोपासणारा असावा\nसरकारी बँकांमध्ये लोकांचा पैसा सुरक्षित\nनागरिकांना प्रामाणिकपणे कर भरण्याची विनंती\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nविदर्भ, मराठवाड्यातील आठ सिंचन प्रकल्पांना केंद्राची मदत\nयंदा ९७ टक्के पाऊस\nहमीभावात दीडपट वाढ होणारच\nशेतीपर्यंत पाणी नेण्याची गरज : नितीन गडकरी\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nआयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ\nअजित वाडेकर यांचे निधन\nसीआरपीएफला सर्वाधिक शौर्य पदके\nमहाराष्ट्राला ५१ पोलिस पदके\nहवाई दल जवानाच्या वेषात अतिरेकी\nराजीव गांधींनीच नाकारला होता दलितांचा हक्क\nरस्ता सुरक्षा विषय अभ्यासक्रमात असावा\nछत्तीसगडचे राज्यपाल बलरामजी दास टंडन यांचे निधन\nउच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र\nआंदोलनात कोट्यवधींची संपत्ती नष्ट होणे भीषणच\nराजीव गांधींच्या मारेकर्‍यांना मुक्त करण्यास केंद्राचा नकार\nबार डान्समध्ये अश्‍लील काय\nनॅशनल हेरॉल्ड प्रकरणी राहुल गांधींना दिलासा नाही\nक्रमांक ३ वरच न्या. जोसेफ यांचा शपथविधी\nजम्मू-काश्मीरच्या कलम ३५-ए वर उद्या सुनावणी\nतीन न्यायमूर्तींची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती\nन्यायाधीशपदी नातेवाईकांच्या नियुक्तीला चाप लागणार\nपीडित बालकांच्या कुठल्याही छायाचित्राला प्रसिद्धी नको\nशबरीमलात महिलांनाही प्रवेशाचा अधिकार\nपंतप्रधान मोदींनी दिल्या इम्रान खान यांना शुभेच्छा\nट्रम्प यांना प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे निमंत्रण\nकाश्मीरची बदनामी करणार्‍या रिपोर्टमागे पाकिस्तानचा हात\nकोरियन द्वीपकल्पातील शांतता प्रक्रियेत भारताचा सहभाग\nभारत घेणार रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली\nसेशेल्समध्ये भारत उभारणार नाविक तळ\nऑगस्टावेस्टलँड : दलालाचे प्रत्यार्पण करण्यास इटलीचा नकार\nराष्ट्रपती तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना\nभारत-ब्रिटनमध्ये होणार प्रत्यार्पण करार\nबांगलादेश परत घेणार आपले ३३ घुसखोर\nइराणवरील बंधनांना भारताचा पाठिंबा नाही\nवाटले नव्हते, ही व्यक्ती पंतप्रधान होईल\nपंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा नाही : शरद पवार\nघुसखोरांचे आदरातिथ्य करायचे का\nएक राष्ट्र, एक निवडणुकीला काँग्रेसचा विरोध\nमोदी सरकारविरुद्ध आंदोलन उभारणार\nअमित शाह महिन्यातून तीन दिवस बंगाल मुक्कामी…\n१७ विरोधी पक्षांना हवी मतपत्रिका\n…तर भारतात रक्ताचे पाट वाहतील\nकाँग्रेसने मान्य केला बोफोर्स घोटाळा\nखटल्याच्या भीतीने राहुल यांचे ते भाषणच काढले\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\nबुलेट ट्रेनसाठी बीईएमएल बनवणार सुटे भाग\n‘बुल’ उधळला: विक्रमी उच्चांकावर विराजमान\nकाँग्रेसच्या भीतीने हादरला होता शेअर बाजार\nभारती एअरटेल, पेमेंट बँकेचा ईकेवायसी परवाना रद्द\nदूरसंचार क्षेत्रात ७५ हजार कर्मचार्‍यांना नारळ\nऐतिहासिक… निर्देशांक ३३ हजारी\nगुंतवणूकदार २५ लाख कोटींनी मालामाल\nरजनीशकुमार स्टेट बँकेचे नवे अध्यक्ष\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nभारतातच तयार होणार सुपर हॉर्नेट\nआयआरएनएसएस-१ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nनेव्हिगेशनल उपग्रहाचे उद्या प्रक्षेपण\n‘जी-सॅट-६ ए’ चे यशस्वी प्रक्षेपण\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nसंरक्षण मंत्रालयाकडून व्यवहार नाही\nसीमेजवळ तैनात होणार चिनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॉकेट\nलष्कराला मिळणार ४०० आधुनिक तोफा\nभीष्म व अजेय रणगाड्यांना स्वदेशी इंजीन\nसीआरपीएफ जवानांना नवे बुलेट प्रूफ जॅकेट\nइसिसचा अतिरेकी अडकला गुप्तचर यंत्रणेच्या जाळ्यात\nसौराष्ट्र सीमेवर पाकची लढाऊ विमाने\nकोणत्याही आव्हानासाठी लष्कर सज्ज\nअग्नी-५ लवकरच लष्कराच्या शस्त्रागारात\nजवानांना १० हजार रुपये कापड भत्ता\nसर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ आला समोर\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nरोहिंग्या निर्वासित नसून, बेकायदेशीर घुसखोरच : किरेन…\n६१,१६४ किमी महामार्गाची कामे सुरू\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान :…\nस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\nनोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन\nपाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात\n२१ हजारांपेक्षा जास्त भारतीयांचे अमेरिकेत अनधिकृत वास्तव्य\nइराणविरोधात अमेरिकेचे एकतर्फी कठोर फेरनिर्बंध\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान :…\nस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\nनिवडणूक नियमाचे उल्लंघन, इम्रान खान यांचा लेखी…\nइम्रान खान यांना खासदारकीची शपथ घ्यायला सशर्त…\n६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू\nअंटार्क्टिकात तुटला अतिविशाल हिमनग\nनोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन\nभारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था\nमल्ल्याची इंग्लंडमधील मालमत्ता जप्त करण्याचे आदेश\nरासायनिक शस्त्रास्त्र वापर बंदीसंबंधित परिषदेला भारताचा पाठिंबा\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nकॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा\nमुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी\nराज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड\nमराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार\nसमृद्धी महामार्गासाठी एकराला ५० लाख रुपये\n‘चाकण पेटवणार्‍या’ पाच हजार जणांवर गुन्हा\nकमी शब्दात व धारदार पोस्ट असावी\nआता घेता येणार वारीचे लाईव्ह दर्शन\nकर्जमाफी कायमस्वरूपी तोडगा नाही : उपराष्ट्रपती\nऔरंगाबादेत पाणीयुद्ध; नळ कापण्यावरून दोन गटात भीषण…\nआता अयोध्येत मंदिर बांधण्यासाठी जाणार\nवंचितांना यमगरवाडी प्रकल्पाने मुख्य प्रवाहात आणले: भैय्याजी…\nनांदेड महानगरपालिकामध्ये कॉंग्रेसची सत्ता\nमुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी\nतुम्ही फक्त चित्रपट दाखवण्याचे काम करा\nसत्ता मिळाली नाही तरी चालेल, पण भाजपा…\nभाजपाने काँग्रेस, राकाँ फोडली असती, म्हणूनच सत्तेत…\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे…\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nगामा पैलवानसह सहा आरोपी अटकेत\nआजपासून फिफा विश्‍वचषकाची जादू\n फुलराणीने दिले २६ वे सुवर्णपदक\nभारताची सुवर्णझळाळी; एकाच दिवशी १७ पदकांची लूट\nतेजस्विनी, अनिश, बजरंगला सुवर्ण\nकुस्तीपटूंना दोन सुवर्णांसह चार पदके\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nशेअर बाजार नव्या शिखरावर\nशेअर बाजाराचा बैल उधळला\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nध्रुपद गायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे निधन\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nतेरा वैभव अमर रहे माँ\nतेरा वैभव अमर रहे माँ\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\n७३ टक्के नागरिकांचा पंतप्रधान मोदींवर विश्‍वास\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\n‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित\nचिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार\nप्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\nअटल, अढळ आणि अमर…\nअटलजी आजचे श्यामाप्रसाद आहेत\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nअटल, अढळ आणि अमर…\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\nअटलजी आजचे श्यामाप्रसाद आहेत\nमेरा परिचय : अटलजींच्या काव्यप्रतिभेतून प्रकटलेले हिंदुसूक्त\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन…\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nराष्ट्रीय एकता दिनानिमित्त ‘एकतेसाठी दौड’\nपरराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज भूतानमध्ये\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची श्री मंजुनाथस्वामी मंदिरात…\nदशम: सौंदर्यलहरी पारायणोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरूत\nनरेंद्र मोदी यांचे नवे मंत्रिमंडळ\nनव्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन्\nश्री गजानन महाराजांची पालखी पंढरपूर वारीहून परतली\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम…\nविधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान\nAll ई-आसमंत ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१२ ऑगस्ट १८ आसमंत\n०५ ऑगस्ट १८ आसमंत\n२९ जुलै १८ आसमंत\n२२ जुलै १८ आसमंत\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१५ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१४ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n०९ मे १८ सदाफुली\n२७ डिसेंबर १७ सदाफुली\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१५ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१४ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळात एकाच दिवशी शंभर बळी\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…\nवृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…\nजनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nवृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…\nस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\n►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…\n►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…\nकॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा\n►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…\nमुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी\n►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…\nराज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड\n►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…\nतेरा वैभव अमर रहे माँ\n॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…\n॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…\n॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…\n‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित\nअभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…\nचिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार\nऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…\nसंजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…\nसूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49\nHome » अग्रलेख, संपादकीय » संधीचे सोने अन सोन्याचा साधू\nसंधीचे सोने अन सोन्याचा साधू\nओ मेरा सोनारे सोनारे सोना…\nले लूंगा जान किसी ने जो छीना रे\nमैने इसे बडे प्यार से कमाया\nमेरा कसूर नही जो मैने लोगोंसे लुटा रेऽऽऽ\nहो, हो, हो… गाणं तेच आहे. मात्र, जरा संदर्भ बदलले आहेत. ‘मेरे घर सोने की गद्दी है’ म्हटल्यावर मग ऐकणार्‍याला वाटतं की काय श्रीमंत माणूस आहे कुणा कुणाचे आयुष्य सोन्याहून पिवळेच असते ना. आता परवा एक बातमी वाचली. एक बाबा आहे. तो पंचवीस किलो सोने अंगावर घालून फिरतो अन् मग त्याच्या रक्षणासाठी पंचेवीस पोलिस आहेत. इकडे महिला असुरक्षित आहेत, अनेक गुन्ह्यांचे केवळ तपासच सुरू असतात. त्याचा निकाल लागत नाही अन् इकडे त्या बाबाच्या रक्षणासाठी पंचेवीस पोलिस आहेत. त्या बाबाचे नाव निरंजन आहे अन् जळतो मात्र बघणारा… पंचेवीस किलो सोने कुणा कुणाचे आयुष्य सोन्याहून पिवळेच असते ना. आता परवा एक बातमी वाचली. एक बाबा आहे. तो पंचवीस किलो सोने अंगावर घालून फिरतो अन् मग त्याच्या रक्षणासाठी पंचेवीस पोलिस आहेत. इकडे महिला असुरक्षित आहेत, अनेक गुन्ह्यांचे केवळ तपासच सुरू असतात. त्याचा निकाल लागत नाही अन् इकडे त्या बाबाच्या रक्षणासाठी पंचेवीस पोलिस आहेत. त्या बाबाचे नाव निरंजन आहे अन् जळतो मात्र बघणारा… पंचेवीस किलो सोने म्हणजे कितो तोळे याचा हिशेब लावा. काय आहे की आपली आर्थिक स्थिती तोळामासाच असल्याने सोने आपण तोळ्याच्या वर कधी अपेक्षितच ठेऊ शकत नाही. एक किलो सोने म्हणजे १०० तोळे इतके माहीत आहे. शाळेत शिकविले होते…\nआम्ही लहान असताना शिक्षण म्हणजे विद्या हेच सोने असते, असे सांगितले जात होते. या साधूला कुणी सांगितले असेल की संपत्ती जगविणे म्हणजे सोनेच असते. त्याने ती विद्या अवगत केली असेल. आता या पंचेवीस किलो सोन्याचे गणित जमवून पाहू… एक तोळा सोने आता ३२ हजार रुपयांचे आहे. १०० तोळे झाले बत्तीस लाख रुपयांचे. पंचेवीस किलो सोने झाले आठ कोटी रुपयांचे… हा साधू सध्या आठ कोटी रुपयांचे सोने अंगावर घालून फिरतो आहे. संधीचे सोने करावे, अशी आपली शिकवण आहे. या साधूने बराच संधीसाधूपणा केला असावा. हा साधू साधा नाही, तो संधीसाधूच आहे. एकतर त्याच्याकडे सोने आहे इतके अन् त्यात तो साधूदेखील आहे. म्हणजे सोने पे सुहागाच. कारण साधू- सन्यासी असल्याने त्याला इन्कमटॅक्स लागत नसावा. हा अंदाज काढण्याचे कारण त्याला हे सोने कुणीतरी; कुणीतरी म्हणण्यापेक्षा कुणी कुणी दानांत दिले असावे. आता दानावर आयकर लागत नाही. आता कर नाही तर डरही नाही भारत हा गरीब देश आहे, असे कोण म्हणेल भारत हा गरीब देश आहे, असे कोण म्हणेल कारण या देशात सर्वसंगपरित्याग करून भगवी वस्त्रे घालून निघालेल्या साधूकडे पंचवीस किलो सोने आहे. या साधूने ते घालून मिरविण्याची संधी साधून घेतली. आता ज्या देशांत साधूकडे इतके सोने असते तो देश गरीब कसा\nयहां डाल डाल पर सोने की\nचिडीया करतीं है बसेरा…\nअसे गाणे आहे. या देशात म्हणजे कधीकाळी सोन्याचा धूर निघत होता. दुधाचा महापूर होता. आता त्याच देशांत दूध उत्पादकांना दुधाचे भाव वाढवून घेण्यासाठी मोर्चा काढावा लागतो. असो. एखाद्या साधूकडे २५ किलो सोने केवळ घालून मिरविण्यासाठीच असेल तर या देशात चाळीस कोट लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगतात यावर कुणी कसा विश्‍वास ठेवेल या लोकसंख्येला अन्नसुरक्षा देण्यासाठी सरकारला योजना राबवावी लागते, हे खरेच वाटायचे नाही. त्या दक्षिणेतल्या एका पुरातन मंदिरांत अरबो रुपयांचे दागिने अन् सोने सापडले होते. इतके होते की नंतर ते मोजणेही बंद करण्यात आले होते. आता पंढरपूरच्या विठोबालाही वीस कोट रुपये कुणीतरी वाहिले. जो तुळशीच्या पानावरही संतुष्ट होतो असा गरिबांचा, तेल्या-तांबोळ्यांचा देव अन् त्यालाही या देशातले त्याचे गरीब भक्त इतके कोटी रुपये वाहत असतील तर मग या देशातल्या गरिबांच्या गरिबीची पातळी काय, हादेखील सवाल आहेच ना या लोकसंख्येला अन्नसुरक्षा देण्यासाठी सरकारला योजना राबवावी लागते, हे खरेच वाटायचे नाही. त्या दक्षिणेतल्या एका पुरातन मंदिरांत अरबो रुपयांचे दागिने अन् सोने सापडले होते. इतके होते की नंतर ते मोजणेही बंद करण्यात आले होते. आता पंढरपूरच्या विठोबालाही वीस कोट रुपये कुणीतरी वाहिले. जो तुळशीच्या पानावरही संतुष्ट होतो असा गरिबांचा, तेल्या-तांबोळ्यांचा देव अन् त्यालाही या देशातले त्याचे गरीब भक्त इतके कोटी रुपये वाहत असतील तर मग या देशातल्या गरिबांच्या गरिबीची पातळी काय, हादेखील सवाल आहेच ना आता मग साधूकडे इतके सोने कसे अन् हा सोनेबाबा आला कुठून… असे प्रश्‍न मात्र विचारायचे नसतात, कारण नदीचे मूळ अन् साधूंचे कुळ कुणी विचारायचे नसते, शोधायचे नसते. तसे करणारा पाप करत असतो. त्यामुळे आपल्या देशांतल्या तपासयंत्रणा असल्या पापांत पडू पाहात नसाव्यात. तरीही काही खुटीउपाड लोकांनी या साधूचे मूळ शोधूनच काढले. कुणी असे सांगतात की या निरंजनबाबाचे मूळ दिल्लीचे आहे. तो तिथला डॉन होता. म्हणजे गुंड होता, असे नाही म्हणायचे. कारण तो आधी काहीही असला तरीही आता मात्र तो साधू आहे. साधू म्हणजे संत. म्हणजे आता त्याला मोह नाही. त्याला साधी वस्त्रे काय नि सोने काय, सारखेच आहे. आता आपण असे म्हणायचे की तो आधी वाल्या होता, आता त्याचा वाल्मीकि ऋषी झाला आहे. त्याने दिल्लीत वाटमार्‍या केल्या असतील. लोकांना अडवून लुटले असेल अन् त्यांच्याकडून पैसे, सोने लुटले असेल. त्यासाठी अनेकांचे बळीही घेतले असतील. मग घरच्यांना विचारले असेल त्याने की तुम्ही माझ्या पापांत सहभागी आहांत का आता मग साधूकडे इतके सोने कसे अन् हा सोनेबाबा आला कुठून… असे प्रश्‍न मात्र विचारायचे नसतात, कारण नदीचे मूळ अन् साधूंचे कुळ कुणी विचारायचे नसते, शोधायचे नसते. तसे करणारा पाप करत असतो. त्यामुळे आपल्या देशांतल्या तपासयंत्रणा असल्या पापांत पडू पाहात नसाव्यात. तरीही काही खुटीउपाड लोकांनी या साधूचे मूळ शोधूनच काढले. कुणी असे सांगतात की या निरंजनबाबाचे मूळ दिल्लीचे आहे. तो तिथला डॉन होता. म्हणजे गुंड होता, असे नाही म्हणायचे. कारण तो आधी काहीही असला तरीही आता मात्र तो साधू आहे. साधू म्हणजे संत. म्हणजे आता त्याला मोह नाही. त्याला साधी वस्त्रे काय नि सोने काय, सारखेच आहे. आता आपण असे म्हणायचे की तो आधी वाल्या होता, आता त्याचा वाल्मीकि ऋषी झाला आहे. त्याने दिल्लीत वाटमार्‍या केल्या असतील. लोकांना अडवून लुटले असेल अन् त्यांच्याकडून पैसे, सोने लुटले असेल. त्यासाठी अनेकांचे बळीही घेतले असतील. मग घरच्यांना विचारले असेल त्याने की तुम्ही माझ्या पापांत सहभागी आहांत का तर त्यांनी नाही म्हटले असेल म्हणून मग सोन्यासह तो साधू झाला असेल. बघाना, एकाच जन्मात गुंड ते साधू असे दोन्ही त्याने साधून घेतले. त्याला ते साधले म्हणून तो साधू. आपल्या देशांत असे ‘साधू’ खूप आहेत. त्यामुळे होते काय की खर्‍या साधूंची बदनामी होते. त्यांच्यावर कुणी विश्‍वास ठेवत नाही. आता खरा कोण अन् खोटा कोण तेच कळत नाही. एक मात्र नक्की की त्या साधूच्या मागे आधीही पोलिस होतेच, कारण तेव्हा तो गुंड होता अन् आताही आहेतच कारण आता तो साधू आहे. आपल्या देशात एकतर गुंडांच्या मागे किंवा साधूंच्या पुढे पोलिस असतात. आधी वाटले होते की हे सोने खरे नसावे… कारण मागे एका बाईने देवाला नवस केला की मला मुलगा होऊ दे, मी तुला सोन्याचे टोपरे वाहीन. तिला मूल झाले. आता तिच्या नवर्‍याला प्रश्‍न पडला की ही आता सोन्याचे टोपरे कसे वाहील देवाला तर त्यांनी नाही म्हटले असेल म्हणून मग सोन्यासह तो साधू झाला असेल. बघाना, एकाच जन्मात गुंड ते साधू असे दोन्ही त्याने साधून घेतले. त्याला ते साधले म्हणून तो साधू. आपल्या देशांत असे ‘साधू’ खूप आहेत. त्यामुळे होते काय की खर्‍या साधूंची बदनामी होते. त्यांच्यावर कुणी विश्‍वास ठेवत नाही. आता खरा कोण अन् खोटा कोण तेच कळत नाही. एक मात्र नक्की की त्या साधूच्या मागे आधीही पोलिस होतेच, कारण तेव्हा तो गुंड होता अन् आताही आहेतच कारण आता तो साधू आहे. आपल्या देशात एकतर गुंडांच्या मागे किंवा साधूंच्या पुढे पोलिस असतात. आधी वाटले होते की हे सोने खरे नसावे… कारण मागे एका बाईने देवाला नवस केला की मला मुलगा होऊ दे, मी तुला सोन्याचे टोपरे वाहीन. तिला मूल झाले. आता तिच्या नवर्‍याला प्रश्‍न पडला की ही आता सोन्याचे टोपरे कसे वाहील देवाला तर तिने मुलाचेच नाव सोन्या ठेवले अन् त्याचे कळकटले मळकटले टोपरे देवाला वाहिले… तर हे असे असते. आता मात्र तो साधू सन्यासी झाला आहे. त्याने कधी काय केले ते आता बघायचे नसते. पुत्र दे म्हणत देवाला नवस केल्यावरून आठवले, तुकाराम महाराज म्हणाले होते, ‘नवसे कन्या-पुत्र होती तो का करावे लागे पती तर तिने मुलाचेच नाव सोन्या ठेवले अन् त्याचे कळकटले मळकटले टोपरे देवाला वाहिले… तर हे असे असते. आता मात्र तो साधू सन्यासी झाला आहे. त्याने कधी काय केले ते आता बघायचे नसते. पुत्र दे म्हणत देवाला नवस केल्यावरून आठवले, तुकाराम महाराज म्हणाले होते, ‘नवसे कन्या-पुत्र होती तो का करावे लागे पती’ हा त्यांचा सवाल रोकडा होता. यावरून तुकाराम महाराजांची एक गोष्ट आठवली. एकदा तुकाराम महाराज अन् त्यांची बायको आवडाई कुठेतरी निघाले होते. तेव्हाच्या पद्धतीनुसार आवडाई नवर्‍याच्या पासून थोडे अंतर राखून मागून चालली होती. तिच्यात अन् महाराजांमध्ये बर्‍यापैकी अंतर निर्माण झाले तरीही तिचे लक्ष मात्र महाराजांवर होतेच. महाराज एका ठिकाणी थांबले अन् त्यांनी खाली नीट बघत पायाने माती सारखी केली अन् ते समोर निघून गेले. ही लगबग तिने पाहिली अन् तिने त्यांना थांबवून विचारले की तिथे तुम्ही पायाने काय केले’ हा त्यांचा सवाल रोकडा होता. यावरून तुकाराम महाराजांची एक गोष्ट आठवली. एकदा तुकाराम महाराज अन् त्यांची बायको आवडाई कुठेतरी निघाले होते. तेव्हाच्या पद्धतीनुसार आवडाई नवर्‍याच्या पासून थोडे अंतर राखून मागून चालली होती. तिच्यात अन् महाराजांमध्ये बर्‍यापैकी अंतर निर्माण झाले तरीही तिचे लक्ष मात्र महाराजांवर होतेच. महाराज एका ठिकाणी थांबले अन् त्यांनी खाली नीट बघत पायाने माती सारखी केली अन् ते समोर निघून गेले. ही लगबग तिने पाहिली अन् तिने त्यांना थांबवून विचारले की तिथे तुम्ही पायाने काय केले महाराज म्हणाले, ‘‘तिथे सोन्याचे कडे पडले होते. त्यावर मी पायाने माती झाकून टाकली. कारण मागून तू येत होतीस अन् तुला ते कडे दिसले असते तर तुला त्याचा मोह झाला असता…’’ ते ऐकून आवडाईने महाराजांना खूप मार्मिक प्रश्‍न विचारला, ‘‘मी तर सामान्य बाई आहे. गृहिणी आहे. संसार करते. षड्रिपूंनी ग्रासली आहे. मोह आहेत, राग आहे… पण; तुम्ही तर संत आहात ना महाराज म्हणाले, ‘‘तिथे सोन्याचे कडे पडले होते. त्यावर मी पायाने माती झाकून टाकली. कारण मागून तू येत होतीस अन् तुला ते कडे दिसले असते तर तुला त्याचा मोह झाला असता…’’ ते ऐकून आवडाईने महाराजांना खूप मार्मिक प्रश्‍न विचारला, ‘‘मी तर सामान्य बाई आहे. गृहिणी आहे. संसार करते. षड्रिपूंनी ग्रासली आहे. मोह आहेत, राग आहे… पण; तुम्ही तर संत आहात ना मग तुम्हाला सोने अन् मातीतला फरक कळला कसा मग तुम्हाला सोने अन् मातीतला फरक कळला कसा आपण ज्याला सोने समजून डोळे विस्फारतो ती त्या माजी गुंड अन् आजी साधूसाठी मातीच असेल… बोला पुंडलिक वरदा, हऽऽऽरी विठ्ठल…\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\nअटल, अढळ आणि अमर…\nFiled under : अग्रलेख, संपादकीय.\nआजपासून फिफा विश्‍वचषकाची जादू\n फुलराणीने दिले २६ वे सुवर्णपदक\nभारताची सुवर्णझळाळी; एकाच दिवशी १७ पदकांची लूट\nतेजस्विनी, अनिश, बजरंगला सुवर्ण\nकुस्तीपटूंना दोन सुवर्णांसह चार पदके\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळात एकाच दिवशी शंभर बळी\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nSAMB on मग न्यायाधीशांसाठी तरी का उभे राहायचे\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nमग न्यायाधीशांसाठी तरी का उभे राहायचे\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\n७/१२ प्रभागाचा : सोलापूर महानगरपालिका निवडणूक २०१७\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (150) आंतरराष्ट्रीय (467) अमेरिका (166) आफ्रिका (7) आशिया (259) ऑस्ट्रेलिया (2) युरोप (32) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (1) ई-पेपर (159) ई-आसमंत (59) ई-मराठवाडा (48) ई-सदाफुली (4) ई-सोलापूर (48) कलाभारत (4) किशोर भारत (2) क्रीडा (20) छायादालन (36) ठळक बातम्या (8) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (886) आसमंत (841) मानसी (10) युवा भरारी (9) विविधा (4) सदाफुली (22) फिचर (16) महाराष्ट्र (435) उ.महाराष्ट्र (3) प.महाराष्ट्र (15) मराठवाडा (5) मुंबई-कोकण (87) विदर्भ (11) सोलापूर (17) रा. स्व. संघ (48) राज्य (738) आंध्र (12) ईशान्य भारत (42) उत्तर प्रदेश (100) ओडिशा (3) कर्नाटक (80) केरळ (31) गुजरात (98) गोवा (11) जम्मू-काश्मीर (94) तामिळनाडू (35) दिल्ली (52) पंजाब-हरयाणा (28) बंगाल (31) बिहार-झारखंड (66) मध्य प्रदेश-छत्तीसगड (21) राजस्थान (21) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,864) अर्थ (76) कृषी (25) नागरी (822) न्यायालय-गुन्हे (262) परराष्ट्र (83) राजकीय (261) वाणिज्य (13) विज्ञान-तंत्रज्ञान (35) संरक्षण (143) संसद (126) सांस्कृतिक (18) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (5) संपादकीय (795) अग्रलेख (382) उपलेख (412) साहित्य (11) स्तंभलेखक (1,031) अजय देशपांडे (34) अपर्णा क्षेमकल्याणी (10) अभय गोखले (25) अविनाश कोल्हे (10) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (29) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (45) डॉ.परीक्षित स. शेवडे (30) डॉ.वाय.मोहितकुमार राव (28) डॉ.सच्चिदानंद शेवडे (28) तरुण विजय (9) दत्ता पंचवाघ (10) दीपक कलढोणे (36) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (3) ब्रि. हेमंत महाजन (55) भाऊ तोरसेकर (111) मल्हार कृष्ण गोखले (52) यमाजी मालकर (35) योगानंद काळे (1) रत्नाकर पिळणकर (27) रमेश पतंगे (11) रविंद्र दाणी (57) ल.त्र्यं. जोशी (19) वसंत काणे (18) श्याम परांडे (20) श्याम पेठकर (55) श्यामकांत जहागीरदार (57) श्रीकांत पवनीकर (10) श्रीनिवास वैद्य (48) सतीष भा. मराठे (6) सुधीर पाठक (6) सुनील कुहीकर (52) सोमनाथ देशमाने (34) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (26)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nशोभा फडणवीस | आषाढी एकादशीचे पर्व माऊलीच्या दर्शनाला निघालेल्या वारकर्‍यांच्या पालख्या नि त्या सोबत पायी निघालेले शिस्तप्रिय वारकरी, हे बघितल्यानंतर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/lawyer-strike-court-work-slow-37882", "date_download": "2018-08-18T08:39:20Z", "digest": "sha1:WX4QVKRA7M3QTNHCOJJXNYRTWIZFIQ5W", "length": 10776, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "lawyer strike court work slow वकिलांच्या संपामुळे न्यायालयांचे काम थंडावले | eSakal", "raw_content": "\nवकिलांच्या संपामुळे न्यायालयांचे काम थंडावले\nशनिवार, 1 एप्रिल 2017\nमुंबई - प्रस्तावित वकील कायद्यातील सुधारणेला विरोध करण्यासाठी राज्यभरातील वकिलांच्या संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे शुक्रवारी (ता. 31) न्यायालयांचे कामकाज थंडावले.\nमुंबई - प्रस्तावित वकील कायद्यातील सुधारणेला विरोध करण्यासाठी राज्यभरातील वकिलांच्या संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे शुक्रवारी (ता. 31) न्यायालयांचे कामकाज थंडावले.\nबार कौन्सिल ऑफ इंडियाने संपाची हाक दिली होती. महाराष्ट्र आणि गोव्यातील अनेक न्यायालयांमध्ये वकील गैरहजर होते. संप यशस्वी झाला, असा दावा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य आशिष देशमुख यांनी केला. मुंबई उच्च न्यायालयात आज न्यायमूर्ती हजर होते. मात्र, वकील मोठ्या संख्येने गैरहजर होते. त्यामुळे अनेक खटले तारीख देऊन तहकूब करण्यात आले. आवी ही वकिलांची संघटनाही संपात सहभागी झाली होती. वकिलांच्या कायद्यात सुचवलेल्या तरतुदींना वकिलांच्या संघटनेने आक्षेप घेतला. या तरतुदींमुळे देशातील विधी अभ्यासक्रम आणि व्यवसायाच्या पारदर्शकता आणि स्वायत्ततेला हानी पोचण्याची शक्‍यता आहे, असे संघटनेचे मत आहे.\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nपंकज भूसे यांचा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव\nसरळगांव - महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी होऊन दिलेल्या उद्दिष्टा पेक्षा जास्त वृक्ष लागवड करून उत्कृष्ट कामगिरी केल्याने...\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून सहाजण जखमी\nबेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने बंगळूरकडे जाणारी व्हीआरएलची आराम बस उलटून चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय...\nउंड्री - पाचव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजूर ठार\nउंड्री - गुलाम अली नगर गल्ली नं 6 दि.13 ऑगस्ट दु.12.30 वाजता एका निर्माणाधीन इमारतीचे काम सुरू असताना पाचव्या मजल्यावर पडून राजशेखर माशाले (वय 33...\nरावेतला स्वतंत्र पोलिस चौकीची मागणी\nवाल्हेकरवाडी - रावेत परिसराचा विकास झपाट्याने वाढत आहे, त्याचप्रमाणे गुन्हेगारीही वाढत आहे. रावेत परिसरात गुन्हा घडला अथवा काही कारणास्तव पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8-%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82.php", "date_download": "2018-08-18T09:06:55Z", "digest": "sha1:TZBRZXKLIFPIUHY64DUHKH74PTREYIWJ", "length": 77989, "nlines": 1225, "source_domain": "tarunbharat.org", "title": "आता आरक्षणाचे आंदोलन थांबवावे… | Tarun Bharat", "raw_content": "\nवीर संघवी, ज्येष्ठ पत्रकार\nउजव्या विचारसरणीला एक मंच उपलब्ध होईल म्हणून पुद्दुचेरी साहित्य उत्सव रद्द करण्याची डाव्यांची मागणी विचित्र...\nप्रशांत उमराव, वकील, सर्वोच्च न्यायालय\nमेरठमध्ये हेलिकॉप्टरमधून शिवभक्त कावडियांवर फुलांचा वर्षाव करणारे मेरठ भागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांना...\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळात एकाच दिवशी शंभर बळी\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nआयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ\nअजित वाडेकर यांचे निधन\nकेरळमध्ये पावसाचे ७७ बळी; १८ हजार बेघर\nवीर संघवी, ज्येष्ठ पत्रकार\nAll अर्थ कृषी नागरी न्यायालय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nआयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ\nअजित वाडेकर यांचे निधन\nसीआरपीएफला सर्वाधिक शौर्य पदके\nमहाराष्ट्राला ५१ पोलिस पदके\nहवाई दल जवानाच्या वेषात अतिरेकी\nराजीव गांधींनीच नाकारला होता दलितांचा हक्क\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nरस्ता सुरक्षा विषय अभ्यासक्रमात असावा\nडिजिटल व्यवहारांवर २० टक्के कॅशबॅक\nघर, वाहनकर्ज महागले; व्याजदरात ०.२५ टक्क्यांची वाढ\nमहसूल वाढल्याने जीएसटी घटणार\nनिर्देशांक नव्या विक्रमी उच्चांकावर\n‘डिमांड ड्राफ्ट’च्या नियमात बदल\nडॉलरसमोर रुपया सक्षम, मोदी सरकार धैर्यवान\nदेशभर आज जीएसटी दिवस पाळणार\nआर्थिक सल्लागार भारतीय मूल्ये जोपासणारा असावा\nसरकारी बँकांमध्ये लोकांचा पैसा सुरक्षित\nनागरिकांना प्रामाणिकपणे कर भरण्याची विनंती\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nविदर्भ, मराठवाड्यातील आठ सिंचन प्रकल्पांना केंद्राची मदत\nयंदा ९७ टक्के पाऊस\nहमीभावात दीडपट वाढ होणारच\nशेतीपर्यंत पाणी नेण्याची गरज : नितीन गडकरी\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nआयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ\nअजित वाडेकर यांचे निधन\nसीआरपीएफला सर्वाधिक शौर्य पदके\nमहाराष्ट्राला ५१ पोलिस पदके\nहवाई दल जवानाच्या वेषात अतिरेकी\nराजीव गांधींनीच नाकारला होता दलितांचा हक्क\nरस्ता सुरक्षा विषय अभ्यासक्रमात असावा\nछत्तीसगडचे राज्यपाल बलरामजी दास टंडन यांचे निधन\nउच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र\nआंदोलनात कोट्यवधींची संपत्ती नष्ट होणे भीषणच\nराजीव गांधींच्या मारेकर्‍यांना मुक्त करण्यास केंद्राचा नकार\nबार डान्समध्ये अश्‍लील काय\nनॅशनल हेरॉल्ड प्रकरणी राहुल गांधींना दिलासा नाही\nक्रमांक ३ वरच न्या. जोसेफ यांचा शपथविधी\nजम्मू-काश्मीरच्या कलम ३५-ए वर उद्या सुनावणी\nतीन न्यायमूर्तींची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती\nन्यायाधीशपदी नातेवाईकांच्या नियुक्तीला चाप लागणार\nपीडित बालकांच्या कुठल्याही छायाचित्राला प्रसिद्धी नको\nशबरीमलात महिलांनाही प्रवेशाचा अधिकार\nपंतप्रधान मोदींनी दिल्या इम्रान खान यांना शुभेच्छा\nट्रम्प यांना प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे निमंत्रण\nकाश्मीरची बदनामी करणार्‍या रिपोर्टमागे पाकिस्तानचा हात\nकोरियन द्वीपकल्पातील शांतता प्रक्रियेत भारताचा सहभाग\nभारत घेणार रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली\nसेशेल्समध्ये भारत उभारणार नाविक तळ\nऑगस्टावेस्टलँड : दलालाचे प्रत्यार्पण करण्यास इटलीचा नकार\nराष्ट्रपती तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना\nभारत-ब्रिटनमध्ये होणार प्रत्यार्पण करार\nबांगलादेश परत घेणार आपले ३३ घुसखोर\nइराणवरील बंधनांना भारताचा पाठिंबा नाही\nवाटले नव्हते, ही व्यक्ती पंतप्रधान होईल\nपंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा नाही : शरद पवार\nघुसखोरांचे आदरातिथ्य करायचे का\nएक राष्ट्र, एक निवडणुकीला काँग्रेसचा विरोध\nमोदी सरकारविरुद्ध आंदोलन उभारणार\nअमित शाह महिन्यातून तीन दिवस बंगाल मुक्कामी…\n१७ विरोधी पक्षांना हवी मतपत्रिका\n…तर भारतात रक्ताचे पाट वाहतील\nकाँग्रेसने मान्य केला बोफोर्स घोटाळा\nखटल्याच्या भीतीने राहुल यांचे ते भाषणच काढले\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\nबुलेट ट्रेनसाठी बीईएमएल बनवणार सुटे भाग\n‘बुल’ उधळला: विक्रमी उच्चांकावर विराजमान\nकाँग्रेसच्या भीतीने हादरला होता शेअर बाजार\nभारती एअरटेल, पेमेंट बँकेचा ईकेवायसी परवाना रद्द\nदूरसंचार क्षेत्रात ७५ हजार कर्मचार्‍यांना नारळ\nऐतिहासिक… निर्देशांक ३३ हजारी\nगुंतवणूकदार २५ लाख कोटींनी मालामाल\nरजनीशकुमार स्टेट बँकेचे नवे अध्यक्ष\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nभारतातच तयार होणार सुपर हॉर्नेट\nआयआरएनएसएस-१ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nनेव्हिगेशनल उपग्रहाचे उद्या प्रक्षेपण\n‘जी-सॅट-६ ए’ चे यशस्वी प्रक्षेपण\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nसंरक्षण मंत्रालयाकडून व्यवहार नाही\nसीमेजवळ तैनात होणार चिनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॉकेट\nलष्कराला मिळणार ४०० आधुनिक तोफा\nभीष्म व अजेय रणगाड्यांना स्वदेशी इंजीन\nसीआरपीएफ जवानांना नवे बुलेट प्रूफ जॅकेट\nइसिसचा अतिरेकी अडकला गुप्तचर यंत्रणेच्या जाळ्यात\nसौराष्ट्र सीमेवर पाकची लढाऊ विमाने\nकोणत्याही आव्हानासाठी लष्कर सज्ज\nअग्नी-५ लवकरच लष्कराच्या शस्त्रागारात\nजवानांना १० हजार रुपये कापड भत्ता\nसर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ आला समोर\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nरोहिंग्या निर्वासित नसून, बेकायदेशीर घुसखोरच : किरेन…\n६१,१६४ किमी महामार्गाची कामे सुरू\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान :…\nस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\nनोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन\nपाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात\n२१ हजारांपेक्षा जास्त भारतीयांचे अमेरिकेत अनधिकृत वास्तव्य\nइराणविरोधात अमेरिकेचे एकतर्फी कठोर फेरनिर्बंध\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान :…\nस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\nनिवडणूक नियमाचे उल्लंघन, इम्रान खान यांचा लेखी…\nइम्रान खान यांना खासदारकीची शपथ घ्यायला सशर्त…\n६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू\nअंटार्क्टिकात तुटला अतिविशाल हिमनग\nनोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन\nभारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था\nमल्ल्याची इंग्लंडमधील मालमत्ता जप्त करण्याचे आदेश\nरासायनिक शस्त्रास्त्र वापर बंदीसंबंधित परिषदेला भारताचा पाठिंबा\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nकॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा\nमुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी\nराज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड\nमराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार\nसमृद्धी महामार्गासाठी एकराला ५० लाख रुपये\n‘चाकण पेटवणार्‍या’ पाच हजार जणांवर गुन्हा\nकमी शब्दात व धारदार पोस्ट असावी\nआता घेता येणार वारीचे लाईव्ह दर्शन\nकर्जमाफी कायमस्वरूपी तोडगा नाही : उपराष्ट्रपती\nऔरंगाबादेत पाणीयुद्ध; नळ कापण्यावरून दोन गटात भीषण…\nआता अयोध्येत मंदिर बांधण्यासाठी जाणार\nवंचितांना यमगरवाडी प्रकल्पाने मुख्य प्रवाहात आणले: भैय्याजी…\nनांदेड महानगरपालिकामध्ये कॉंग्रेसची सत्ता\nमुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी\nतुम्ही फक्त चित्रपट दाखवण्याचे काम करा\nसत्ता मिळाली नाही तरी चालेल, पण भाजपा…\nभाजपाने काँग्रेस, राकाँ फोडली असती, म्हणूनच सत्तेत…\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे…\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nगामा पैलवानसह सहा आरोपी अटकेत\nआजपासून फिफा विश्‍वचषकाची जादू\n फुलराणीने दिले २६ वे सुवर्णपदक\nभारताची सुवर्णझळाळी; एकाच दिवशी १७ पदकांची लूट\nतेजस्विनी, अनिश, बजरंगला सुवर्ण\nकुस्तीपटूंना दोन सुवर्णांसह चार पदके\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nशेअर बाजार नव्या शिखरावर\nशेअर बाजाराचा बैल उधळला\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nध्रुपद गायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे निधन\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nतेरा वैभव अमर रहे माँ\nतेरा वैभव अमर रहे माँ\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\n७३ टक्के नागरिकांचा पंतप्रधान मोदींवर विश्‍वास\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\n‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित\nचिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार\nप्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\nअटल, अढळ आणि अमर…\nअटलजी आजचे श्यामाप्रसाद आहेत\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nअटल, अढळ आणि अमर…\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\nअटलजी आजचे श्यामाप्रसाद आहेत\nमेरा परिचय : अटलजींच्या काव्यप्रतिभेतून प्रकटलेले हिंदुसूक्त\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन…\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nराष्ट्रीय एकता दिनानिमित्त ‘एकतेसाठी दौड’\nपरराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज भूतानमध्ये\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची श्री मंजुनाथस्वामी मंदिरात…\nदशम: सौंदर्यलहरी पारायणोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरूत\nनरेंद्र मोदी यांचे नवे मंत्रिमंडळ\nनव्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन्\nश्री गजानन महाराजांची पालखी पंढरपूर वारीहून परतली\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम…\nविधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान\nAll ई-आसमंत ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१२ ऑगस्ट १८ आसमंत\n०५ ऑगस्ट १८ आसमंत\n२९ जुलै १८ आसमंत\n२२ जुलै १८ आसमंत\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१५ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१४ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n०९ मे १८ सदाफुली\n२७ डिसेंबर १७ सदाफुली\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१५ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१४ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळात एकाच दिवशी शंभर बळी\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…\nवृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…\nजनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nवृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…\nस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\n►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…\n►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…\nकॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा\n►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…\nमुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी\n►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…\nराज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड\n►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…\nतेरा वैभव अमर रहे माँ\n॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…\n॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…\n॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…\n‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित\nअभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…\nचिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार\nऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…\nसंजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…\nसूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49\nHome » अग्रलेख, संपादकीय » आता आरक्षणाचे आंदोलन थांबवावे…\nआता आरक्षणाचे आंदोलन थांबवावे…\nमराठा आरक्षणाचा राज्यातील चिघळलेला (की मुद्दाम चिघळविलेला) प्रश्‍न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या संयमाने आणि निर्धाराने सोडविला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच करायला हवे. मराठा समाजाला आरक्षण आमचेच सरकार देणार आणि तेही टिकाऊ, देवेंद्र फडणवीस यांच्या या ग्वाहीवर, ते इतर चलाख नेत्यांसारखे नसल्यामुळे लोकांनी विश्‍वास ठेवला पाहिजे. संपूर्ण मंत्रिमंडळ, सत्ताधारी पक्ष आणि समाजातील शहाणे मान्यवर यांनीदेखील मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी ठाम राहून, एक सकारात्मक संदेश समाजात दिला आहे.\nहा प्रश्‍न चिघळत राहावा आणि त्याचा लाभ निवडणुकीत घ्यावा, अशी मनीषा बाळगून जे कुणी राजकीय पुढारी मनात मांडे खात होते, त्यांची मात्र साफ निराशा झाली आहे. समाजात उद्भवलेले प्रश्‍न किंवा समस्या या तत्काळ न्याय्य मार्गाने सोडवायच्या असतात, याचाच या मतलबी नेत्यांना विसर पडला आहे.\nमुळात, मराठा आरक्षणाचा प्रश्‍न २००३-०४ सालचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, माजी मंत्री व खासदार शालिनीताई पाटील यांनी हा मुद्दा मांडला होता. त्या वेळी महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा असलेले मराठ्यांचे कथित नेते शरद पवार यांना शालिनीताई पाटील यांची ही मागणी योग्य वाटली नाही. कदाचित शालिनीताई वरचढ होतील, अशी भीतीही त्यांना वाटली असावी. त्यानंतर पवारांनी शालिनीताईंना खड्यासारखे बाजूला सारून, शालिनीताईंचे राजकीय आयुष्य संपवून टाकले. त्यानंतर इतकी वर्षे सत्तेचे सुख भोगताना शरद पवारांना कधीही मराठा आरक्षणाची आठवण झाली नाही. मराठा समाज पाठीशी असल्यामुळे तशी त्यांना गरजही वाटली नसावी. परंतु, २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची धुळधाण झाली. एकूण ४८ जागांपैकी राष्ट्रवादीला केवळ चारच जागा- कोल्हापूर, सातारा, बारामती व माढा- जिंकता आल्या. मराठा समाजाने साथ सोडल्याशिवाय असे घडले नसते, हे जाणून राजकीय नेत्यांनी चाणाक्षपणे डावपेच लढविणे सुरू केले. या समाजाला भडकावून पुन्हा आपल्या वळचणीखाली आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्याचाच एक व महत्त्वाचा भाग म्हणजे मराठा आरक्षणाचे आंदोलन. शालिनीताई पाटील यांनी तर स्पष्ट आरोप केला आहे की, शरद पवार बोलतात एक व करतात दुसरेच आणि आतातरी त्यांनी असे करू नये, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. आज मराठा आरक्षणासाठी आग्रही असणार्‍या व त्यासाठी प्रसंगी घटनादुरुस्ती करण्याची, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अक्कल सांगणार्‍या शरद पवारांनी, १२-१४ वर्षांपूर्वीच शालिनीताई पाटील यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत कारवाई केली असती, तर आज मराठा आरक्षणाचे चित्र वेगळेच दिसले असते. आज शरद पवार मराठा आरक्षण दिले पाहिजे असे म्हणत आहेत. त्यावर कुणीही विश्‍वास ठेवायला तयार नाही. कारण ओठात एक व पोटात दुसरेच. आता ते पूर्णपणे उघडे पडले आहेत. तेच का म्हणून मराठा समाजाचे जे कुणी नेते आतापर्यंत मिरवत होते, ते सर्वजण उताणे पडले आहेत. इतकी वर्षे केवळ मूठभर लोकांची घरे पैशाने भरण्यात आलीत. सर्वसामान्य मराठा समाज मात्र तसाच भणंग अवस्थेत राहिला. हे सत्य आज अत्यंत कठोरपणे समोर येत आहे. दुसरे असे की, मराठा आरक्षण देणे आज कायद्याच्या दृष्टीनेही थोडे किचकट झाले आहे. पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षण देता येत नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. त्यामुळे घिसाडघाईमुळे मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला तरी तो सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही. हे सर्व ज्ञात असतानाही, केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांची या निमित्ताने कोंडी करायची, या दुष्ट हेतूनेच हा सगळा हिंसाचाराचा खेळ राजकीय सारिपाटावर मांडण्यात आला.\nसर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकायचे असेल, तर आधी या समाजाला मागासवर्गीयांच्या व्याख्येत बसवावे लागेल. त्यासाठी फडणवीस सरकारने मागासवर्ग आयोगाकडे हा प्रश्‍न सोपविला आहे. एक प्रामाणिक सरकार जितके काही करू शकते, तितके या सरकारने मनापासून केले आहे. परंतु, ज्यांना मराठ्यांना आरक्षण मिळण्यापेक्षा, ही व्होटबँक आपल्याकडे कशी वळेल यातच अधिक स्वारस्य आहे, त्यांना फडणवीस सरकारचे हे प्रयत्न कसे गोड वाटणार विधिमंडळात, सार्वजनिक प्रतिक्रिया देताना चोपड्या गोष्टी बोलायच्या आणि तिकडे पडद्यामागून हे आंदोलन कसे चिघळेल, कसे हिंसक बनेल व त्यामुळे फडणवीस सरकार निवडणुकीच्या तोंडावर कसे अडचणीत येईल, असे प्रयत्न करायचे. अधिकांश मराठा नेत्यांचे हेच कारनामे सुरू होते. ते सर्व कारनामे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संवेदनशीलतेने, प्रामाणिकतेने, स्पष्टवक्तेपणाने व मुत्सद्दीपणाने थंडे केलेत. देवेंद्र फडणवीस यांचा हा अनुभव केवळ मराठा आरक्षणाबाबतच आलेला नाही. गेल्या चार वर्षांत जितकी काही आंदोलने झालीत, मागण्या समोर आल्यात, त्या संदर्भातही या सरकारने संवेदनशीलतेने तत्काळ निर्णय घेऊन, समाजाला आश्‍वस्त व समाधानी केले आहे. जे न्याय्य आहे, हक्काचे आहे, ते देण्याला या सरकारने कधीही विलंब किंवा टाळाटाळ केली नाही. शेतकर्‍यांच्या बाबतीत तर आतापर्यंतचे कुठलेही सरकार, फडणवीस सरकारइतके संवेदनशील सिद्ध झाले नाही. समाजाची सेवा करण्यासाठी राजकारणाचा मार्ग स्वीकारणार्‍यांकडून हेच अपेक्षित होते आणि आहे. मराठ्यांना टिकाऊ आरक्षण देण्यात, किती व काय अडचणी आहेत, याची कल्पना मुख्यमंत्र्यांना आहे व ती त्यांनी सर्वांना करूनही दिली आहे. त्याचा निर्णय जेव्हा होईल तेव्हा होईल. परंतु, त्या काळात, मराठा समाजाला ताटकळत न ठेवता, त्यांनी आरक्षणाच्या समकक्ष अनेक योजना व सवलती जाहीर केल्या आहेत. राज्यात ७२ हजार पदभरती आहे. त्यातही मराठा समाज वंचित राहू नये म्हणून या ७२ हजारांत १६ टक्के जागा रिक्त ठेवण्यात येणार आहेत. शिवाय मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी, उद्योजकांसाठी प्रोत्साहनपर व मदतीच्या योजना जाहीर केल्या आहेत. मनात एक व कृतीतही तेच असले की, समाजही ते समजून घेतो. संपूर्ण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून राज्यातील प्रत्येक जण माझा सुहृद आहे आणि त्याचा योगक्षेम सांभाळण्याची जबाबदारी जनतेने माझ्यावर सोपविली आहे, ही जाणीव हृदयात सतत जागृत होती म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांना ही समस्या सोडविण्यात यश आले. ही जाणीव आधीच्या राज्यकर्त्यांमध्ये असती, तर आज महाराष्ट्राचे रूप अधिकच सुंदर, संपन्न व समृद्ध दिसले असते. आता मराठा समाजाने तुटेपर्यंत न ताणता, आपल्या राज्याला संपन्न व श्रीमंत करण्यासाठी सर्वांसोबत झटण्याच्या कार्याला प्राधान्य द्यावे, हीच अपेक्षा आहे…\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\nअटल, अढळ आणि अमर…\nFiled under : अग्रलेख, संपादकीय.\nआजपासून फिफा विश्‍वचषकाची जादू\n फुलराणीने दिले २६ वे सुवर्णपदक\nभारताची सुवर्णझळाळी; एकाच दिवशी १७ पदकांची लूट\nतेजस्विनी, अनिश, बजरंगला सुवर्ण\nकुस्तीपटूंना दोन सुवर्णांसह चार पदके\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळात एकाच दिवशी शंभर बळी\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nSAMB on मग न्यायाधीशांसाठी तरी का उभे राहायचे\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nमग न्यायाधीशांसाठी तरी का उभे राहायचे\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\n७/१२ प्रभागाचा : सोलापूर महानगरपालिका निवडणूक २०१७\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (150) आंतरराष्ट्रीय (467) अमेरिका (166) आफ्रिका (7) आशिया (259) ऑस्ट्रेलिया (2) युरोप (32) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (1) ई-पेपर (159) ई-आसमंत (59) ई-मराठवाडा (48) ई-सदाफुली (4) ई-सोलापूर (48) कलाभारत (4) किशोर भारत (2) क्रीडा (20) छायादालन (36) ठळक बातम्या (8) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (886) आसमंत (841) मानसी (10) युवा भरारी (9) विविधा (4) सदाफुली (22) फिचर (16) महाराष्ट्र (435) उ.महाराष्ट्र (3) प.महाराष्ट्र (15) मराठवाडा (5) मुंबई-कोकण (87) विदर्भ (11) सोलापूर (17) रा. स्व. संघ (48) राज्य (738) आंध्र (12) ईशान्य भारत (42) उत्तर प्रदेश (100) ओडिशा (3) कर्नाटक (80) केरळ (31) गुजरात (98) गोवा (11) जम्मू-काश्मीर (94) तामिळनाडू (35) दिल्ली (52) पंजाब-हरयाणा (28) बंगाल (31) बिहार-झारखंड (66) मध्य प्रदेश-छत्तीसगड (21) राजस्थान (21) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,864) अर्थ (76) कृषी (25) नागरी (822) न्यायालय-गुन्हे (262) परराष्ट्र (83) राजकीय (261) वाणिज्य (13) विज्ञान-तंत्रज्ञान (35) संरक्षण (143) संसद (126) सांस्कृतिक (18) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (5) संपादकीय (795) अग्रलेख (382) उपलेख (412) साहित्य (11) स्तंभलेखक (1,031) अजय देशपांडे (34) अपर्णा क्षेमकल्याणी (10) अभय गोखले (25) अविनाश कोल्हे (10) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (29) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (45) डॉ.परीक्षित स. शेवडे (30) डॉ.वाय.मोहितकुमार राव (28) डॉ.सच्चिदानंद शेवडे (28) तरुण विजय (9) दत्ता पंचवाघ (10) दीपक कलढोणे (36) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (3) ब्रि. हेमंत महाजन (55) भाऊ तोरसेकर (111) मल्हार कृष्ण गोखले (52) यमाजी मालकर (35) योगानंद काळे (1) रत्नाकर पिळणकर (27) रमेश पतंगे (11) रविंद्र दाणी (57) ल.त्र्यं. जोशी (19) वसंत काणे (18) श्याम परांडे (20) श्याम पेठकर (55) श्यामकांत जहागीरदार (57) श्रीकांत पवनीकर (10) श्रीनिवास वैद्य (48) सतीष भा. मराठे (6) सुधीर पाठक (6) सुनील कुहीकर (52) सोमनाथ देशमाने (34) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (26)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nसुनील कुहीकर | एव्हाना पहिल्या वर्गात नाव दाखल करण्याचं वय झालं होतं. पण उपाय नव्हता. गावात शाळाच नव्हती. करणार काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/fujifilm-finepix-ax550-point-shoot-digital-camera-red-price-pZPGW.html", "date_download": "2018-08-18T08:14:51Z", "digest": "sha1:F3YUWGBEHWH5POZOIHSHZFZK75PNYABE", "length": 18197, "nlines": 454, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फुजिफिल्म फिनेपिक्स अक्स५५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स५५० पॉईंट & शूट\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स५५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स५५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स५५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\nवरील टेबल मध्ये फुजिफिल्म फिनेपिक्स अक्स५५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड किंमत ## आहे.\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स५५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स५५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड दर नियमितपणे बदलते. कृपया फुजिफिल्म फिनेपिक्स अक्स५५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स५५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 37 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स५५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड वैशिष्ट्य\nसेल्फ टाइमर 10 sec\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 Inches\nऑडिओ विडिओ इंटरफेस AV Output\nरेड इये रेडुकशन Yes\nडिस्प्ले तुपे LCD Display\nस्क्रीन सिझे 2.7 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230000 dots\nमेमरी कार्ड तुपे SD, SDHC, SDXC\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स५५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B6-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2018-08-18T09:08:07Z", "digest": "sha1:JXPIQVEDPBZPA6AOOX36PJO6NZLGBULQ", "length": 3546, "nlines": 59, "source_domain": "m4marathi.com", "title": "स्टायलिश विंटर कॅप्स | m4marathi", "raw_content": "\nस्टायलिश, वॉर्म आणि थोडी हटके विंटर कॅप या सिझनमध्ये खरेदी करण्याचा चान्स महिला आणि तरुणी शोधताना दिसतात. यंदाच्या विंटर सिझनमध्ये पारंपरिक मफलर, स्कार्फ वा स्टोल्स गुंडाळण्यापेक्षा आकर्षक रंगात, डिझाईनमध्ये उपलब्ध असणार्‍या विंटर कॅप्सने महाविद्यालयीन वा कार्यालयीन पोषाख उठावदार करता येईल. लहानग्यांकरिताही अशा कॅप्स विविध आकारांत उपलब्ध आहेत. पॉलिस्टर, कॉटन आणि लोकरीपासून तयार झालेल्या या कॅपचे फॅब्रिक उबदार आणि केसांना, त्वचेला मुलायम स्पर्श देणारे ठरले आहे. विविध रंगांत, तसेच बजेटमध्ये या कॅप बाजारात दाखल झाल्या आहेत. ई-दिवाळी साजरी केल्यानतर यंदाच्या विंटर सिझनची उबदार कपडे खरेदीही ऑनलाइन करता येते. आकर्षक कॅप उपलब्ध आहेत.\nपेहराव पारंपरिक , लुक नवा .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/gossips/ase-he-kanyadaan-bids-a-final-goodbye-to-its-viewers", "date_download": "2018-08-18T08:18:05Z", "digest": "sha1:JOP6FUR33L7WKRF6K2M7VMV2MKG73ZLJ", "length": 4812, "nlines": 55, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Ase He Kanyadaan bids a final goodbye to its viewers | Marathi Dhamaal", "raw_content": "\n‘असे हे कन्यादान’चा प्रेक्षकांना निरोप\nछोट्या पडद्यावर सारा टीआरपीचा खेळ सुरू असतो. प्रेक्षकांच्या आवडी-निवडीला तेथे थारा नसतो. कधी कधी रटाळ मालिका वर्षानुवर्ष चालतात तर कधी सुंदर कथानकक असलेल्या मालिका मर्यादित भागातच संपविण्यात येतात. हे टीआरपीचं गणित प्रेक्षकांना पचवणं मात्र कठीण जातं.\nवडील-मुलीच्या नात्यावर आधारित ‘असे हे कन्यादान’ ही झी मराठीवरील मालिका अवघ्या काही महिन्यांपूर्वीच सुरू झाली होती. सूत्रांच्या माहितीनुसार प्रेक्षकांच्या अल्प प्रतिसादामुळे ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. कौटुंबिक मालिका असली तरी टीआरपीच्या रेसमध्ये ती मागे पडत असल्याने निर्मात्यांनी ती बंद करण्याचा निर्णय घेतलाय.\n‘असे हे कन्यादान’ची जागा आता ‘नांदा सौख्य भरे’ ही नवी मालिका घेणार आहे.\nतुम्हाला हे वाचायला आवडेल \n‘चला हवा येऊ द्या’ का घेतायेत विश्रांती...\n'गच्ची' वर झाला होता गंभीर अपघात\nहि मराठी अभिनेत्री लवकरच करतेय लग्न...\nअमृताला कोणी लिहिल पत्र...\nबघा शनायाने आयुष्यात पहिल्यांदा काय घेतला विकत\nसुबोध भावे करणार प्राजक्ता माळीसोबत स्क्रिन शेअर\n‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित मराठी चित्रपटाची निर्मिती करणार\n लाफ्टर क्वीन प्राजक्ता हनमघरचे झाले शुभमंगल\nइरफान खान आणि डलक्यूअर सलमान यांच्यासोबत झळकणार मिथिला पालकर\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation परत एकदा स्वप्निल जोशी झाला ट्रेण्डिग टॉप स्टार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://punerispeaks.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2018-08-18T08:38:34Z", "digest": "sha1:GUDXIJONDHM27W5V3EOV6RUXRY4HI45S", "length": 2587, "nlines": 59, "source_domain": "punerispeaks.com", "title": "विजेपासून वाचण्याचे उपाय Archives - Puneri Speaks", "raw_content": "\nTag: विजेपासून वाचण्याचे उपाय\nपावसाळ्यात वीज चमकत असताना घ्यावयाची काळजी\nपावसाळ्यात वीज चमकत असताना घ्यावयाची काळजी वीज एका ठिकाणी फक्त एकाच वेळेस पडते- हा एक गैरसमज असून वीज अनेक ठिकाणी … Read More “पावसाळ्यात वीज चमकत असताना घ्यावयाची काळजी”\nAsian Games 2018: आशियाई क्रीडा स्पर्धा वेळापत्रक, प्रक्षेपण, कबड्डी संघ वेळापत्रक\nपिंपरीत प्रियकराने ‘Shivde, I Am Sorry’ चे ३०० फलक लावले, कोण आहे शिवडे\nअटल बिहारी वाजपेयी माहिती, अटल बिहारी वाजपेयी विशेष , अटल बिहारी वाजपेयी मराठी, अटल बिहारी वाजपेयी कविता\nपुणे तिथे काय उणे: देशात राहण्यासाठी पुणे शहर अव्वल स्थानी\nआरक्षण – एक शोधनिबंध | आरक्षण माहिती | आरक्षण म्हणजे काय\nRaj Thackeray VS Ajit Pawar: पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळ्यात एकमेकांवर टीका, वॉटरकप 2018 विजेते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%8F%E0%A4%A8.php", "date_download": "2018-08-18T09:07:16Z", "digest": "sha1:5JVMFFVO6X4FSV7NDDGVYAEFM3BLS2WQ", "length": 81149, "nlines": 1235, "source_domain": "tarunbharat.org", "title": "बांगलादेशी घुसखोर आणि एनआरसी | Tarun Bharat", "raw_content": "\nवीर संघवी, ज्येष्ठ पत्रकार\nउजव्या विचारसरणीला एक मंच उपलब्ध होईल म्हणून पुद्दुचेरी साहित्य उत्सव रद्द करण्याची डाव्यांची मागणी विचित्र...\nप्रशांत उमराव, वकील, सर्वोच्च न्यायालय\nमेरठमध्ये हेलिकॉप्टरमधून शिवभक्त कावडियांवर फुलांचा वर्षाव करणारे मेरठ भागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांना...\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळात एकाच दिवशी शंभर बळी\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nआयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ\nअजित वाडेकर यांचे निधन\nकेरळमध्ये पावसाचे ७७ बळी; १८ हजार बेघर\nवीर संघवी, ज्येष्ठ पत्रकार\nAll अर्थ कृषी नागरी न्यायालय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nआयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ\nअजित वाडेकर यांचे निधन\nसीआरपीएफला सर्वाधिक शौर्य पदके\nमहाराष्ट्राला ५१ पोलिस पदके\nहवाई दल जवानाच्या वेषात अतिरेकी\nराजीव गांधींनीच नाकारला होता दलितांचा हक्क\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nरस्ता सुरक्षा विषय अभ्यासक्रमात असावा\nडिजिटल व्यवहारांवर २० टक्के कॅशबॅक\nघर, वाहनकर्ज महागले; व्याजदरात ०.२५ टक्क्यांची वाढ\nमहसूल वाढल्याने जीएसटी घटणार\nनिर्देशांक नव्या विक्रमी उच्चांकावर\n‘डिमांड ड्राफ्ट’च्या नियमात बदल\nडॉलरसमोर रुपया सक्षम, मोदी सरकार धैर्यवान\nदेशभर आज जीएसटी दिवस पाळणार\nआर्थिक सल्लागार भारतीय मूल्ये जोपासणारा असावा\nसरकारी बँकांमध्ये लोकांचा पैसा सुरक्षित\nनागरिकांना प्रामाणिकपणे कर भरण्याची विनंती\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nविदर्भ, मराठवाड्यातील आठ सिंचन प्रकल्पांना केंद्राची मदत\nयंदा ९७ टक्के पाऊस\nहमीभावात दीडपट वाढ होणारच\nशेतीपर्यंत पाणी नेण्याची गरज : नितीन गडकरी\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nआयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ\nअजित वाडेकर यांचे निधन\nसीआरपीएफला सर्वाधिक शौर्य पदके\nमहाराष्ट्राला ५१ पोलिस पदके\nहवाई दल जवानाच्या वेषात अतिरेकी\nराजीव गांधींनीच नाकारला होता दलितांचा हक्क\nरस्ता सुरक्षा विषय अभ्यासक्रमात असावा\nछत्तीसगडचे राज्यपाल बलरामजी दास टंडन यांचे निधन\nउच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र\nआंदोलनात कोट्यवधींची संपत्ती नष्ट होणे भीषणच\nराजीव गांधींच्या मारेकर्‍यांना मुक्त करण्यास केंद्राचा नकार\nबार डान्समध्ये अश्‍लील काय\nनॅशनल हेरॉल्ड प्रकरणी राहुल गांधींना दिलासा नाही\nक्रमांक ३ वरच न्या. जोसेफ यांचा शपथविधी\nजम्मू-काश्मीरच्या कलम ३५-ए वर उद्या सुनावणी\nतीन न्यायमूर्तींची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती\nन्यायाधीशपदी नातेवाईकांच्या नियुक्तीला चाप लागणार\nपीडित बालकांच्या कुठल्याही छायाचित्राला प्रसिद्धी नको\nशबरीमलात महिलांनाही प्रवेशाचा अधिकार\nपंतप्रधान मोदींनी दिल्या इम्रान खान यांना शुभेच्छा\nट्रम्प यांना प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे निमंत्रण\nकाश्मीरची बदनामी करणार्‍या रिपोर्टमागे पाकिस्तानचा हात\nकोरियन द्वीपकल्पातील शांतता प्रक्रियेत भारताचा सहभाग\nभारत घेणार रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली\nसेशेल्समध्ये भारत उभारणार नाविक तळ\nऑगस्टावेस्टलँड : दलालाचे प्रत्यार्पण करण्यास इटलीचा नकार\nराष्ट्रपती तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना\nभारत-ब्रिटनमध्ये होणार प्रत्यार्पण करार\nबांगलादेश परत घेणार आपले ३३ घुसखोर\nइराणवरील बंधनांना भारताचा पाठिंबा नाही\nवाटले नव्हते, ही व्यक्ती पंतप्रधान होईल\nपंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा नाही : शरद पवार\nघुसखोरांचे आदरातिथ्य करायचे का\nएक राष्ट्र, एक निवडणुकीला काँग्रेसचा विरोध\nमोदी सरकारविरुद्ध आंदोलन उभारणार\nअमित शाह महिन्यातून तीन दिवस बंगाल मुक्कामी…\n१७ विरोधी पक्षांना हवी मतपत्रिका\n…तर भारतात रक्ताचे पाट वाहतील\nकाँग्रेसने मान्य केला बोफोर्स घोटाळा\nखटल्याच्या भीतीने राहुल यांचे ते भाषणच काढले\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\nबुलेट ट्रेनसाठी बीईएमएल बनवणार सुटे भाग\n‘बुल’ उधळला: विक्रमी उच्चांकावर विराजमान\nकाँग्रेसच्या भीतीने हादरला होता शेअर बाजार\nभारती एअरटेल, पेमेंट बँकेचा ईकेवायसी परवाना रद्द\nदूरसंचार क्षेत्रात ७५ हजार कर्मचार्‍यांना नारळ\nऐतिहासिक… निर्देशांक ३३ हजारी\nगुंतवणूकदार २५ लाख कोटींनी मालामाल\nरजनीशकुमार स्टेट बँकेचे नवे अध्यक्ष\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nभारतातच तयार होणार सुपर हॉर्नेट\nआयआरएनएसएस-१ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nनेव्हिगेशनल उपग्रहाचे उद्या प्रक्षेपण\n‘जी-सॅट-६ ए’ चे यशस्वी प्रक्षेपण\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nसंरक्षण मंत्रालयाकडून व्यवहार नाही\nसीमेजवळ तैनात होणार चिनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॉकेट\nलष्कराला मिळणार ४०० आधुनिक तोफा\nभीष्म व अजेय रणगाड्यांना स्वदेशी इंजीन\nसीआरपीएफ जवानांना नवे बुलेट प्रूफ जॅकेट\nइसिसचा अतिरेकी अडकला गुप्तचर यंत्रणेच्या जाळ्यात\nसौराष्ट्र सीमेवर पाकची लढाऊ विमाने\nकोणत्याही आव्हानासाठी लष्कर सज्ज\nअग्नी-५ लवकरच लष्कराच्या शस्त्रागारात\nजवानांना १० हजार रुपये कापड भत्ता\nसर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ आला समोर\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nरोहिंग्या निर्वासित नसून, बेकायदेशीर घुसखोरच : किरेन…\n६१,१६४ किमी महामार्गाची कामे सुरू\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान :…\nस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\nनोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन\nपाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात\n२१ हजारांपेक्षा जास्त भारतीयांचे अमेरिकेत अनधिकृत वास्तव्य\nइराणविरोधात अमेरिकेचे एकतर्फी कठोर फेरनिर्बंध\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान :…\nस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\nनिवडणूक नियमाचे उल्लंघन, इम्रान खान यांचा लेखी…\nइम्रान खान यांना खासदारकीची शपथ घ्यायला सशर्त…\n६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू\nअंटार्क्टिकात तुटला अतिविशाल हिमनग\nनोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन\nभारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था\nमल्ल्याची इंग्लंडमधील मालमत्ता जप्त करण्याचे आदेश\nरासायनिक शस्त्रास्त्र वापर बंदीसंबंधित परिषदेला भारताचा पाठिंबा\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nकॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा\nमुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी\nराज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड\nमराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार\nसमृद्धी महामार्गासाठी एकराला ५० लाख रुपये\n‘चाकण पेटवणार्‍या’ पाच हजार जणांवर गुन्हा\nकमी शब्दात व धारदार पोस्ट असावी\nआता घेता येणार वारीचे लाईव्ह दर्शन\nकर्जमाफी कायमस्वरूपी तोडगा नाही : उपराष्ट्रपती\nऔरंगाबादेत पाणीयुद्ध; नळ कापण्यावरून दोन गटात भीषण…\nआता अयोध्येत मंदिर बांधण्यासाठी जाणार\nवंचितांना यमगरवाडी प्रकल्पाने मुख्य प्रवाहात आणले: भैय्याजी…\nनांदेड महानगरपालिकामध्ये कॉंग्रेसची सत्ता\nमुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी\nतुम्ही फक्त चित्रपट दाखवण्याचे काम करा\nसत्ता मिळाली नाही तरी चालेल, पण भाजपा…\nभाजपाने काँग्रेस, राकाँ फोडली असती, म्हणूनच सत्तेत…\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे…\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nगामा पैलवानसह सहा आरोपी अटकेत\nआजपासून फिफा विश्‍वचषकाची जादू\n फुलराणीने दिले २६ वे सुवर्णपदक\nभारताची सुवर्णझळाळी; एकाच दिवशी १७ पदकांची लूट\nतेजस्विनी, अनिश, बजरंगला सुवर्ण\nकुस्तीपटूंना दोन सुवर्णांसह चार पदके\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nशेअर बाजार नव्या शिखरावर\nशेअर बाजाराचा बैल उधळला\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nध्रुपद गायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे निधन\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nतेरा वैभव अमर रहे माँ\nतेरा वैभव अमर रहे माँ\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\n७३ टक्के नागरिकांचा पंतप्रधान मोदींवर विश्‍वास\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\n‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित\nचिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार\nप्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\nअटल, अढळ आणि अमर…\nअटलजी आजचे श्यामाप्रसाद आहेत\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nअटल, अढळ आणि अमर…\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\nअटलजी आजचे श्यामाप्रसाद आहेत\nमेरा परिचय : अटलजींच्या काव्यप्रतिभेतून प्रकटलेले हिंदुसूक्त\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन…\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nराष्ट्रीय एकता दिनानिमित्त ‘एकतेसाठी दौड’\nपरराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज भूतानमध्ये\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची श्री मंजुनाथस्वामी मंदिरात…\nदशम: सौंदर्यलहरी पारायणोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरूत\nनरेंद्र मोदी यांचे नवे मंत्रिमंडळ\nनव्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन्\nश्री गजानन महाराजांची पालखी पंढरपूर वारीहून परतली\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम…\nविधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान\nAll ई-आसमंत ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१२ ऑगस्ट १८ आसमंत\n०५ ऑगस्ट १८ आसमंत\n२९ जुलै १८ आसमंत\n२२ जुलै १८ आसमंत\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१५ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१४ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n०९ मे १८ सदाफुली\n२७ डिसेंबर १७ सदाफुली\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१५ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१४ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळात एकाच दिवशी शंभर बळी\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…\nवृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…\nजनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nवृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…\nस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\n►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…\n►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…\nकॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा\n►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…\nमुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी\n►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…\nराज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड\n►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…\nतेरा वैभव अमर रहे माँ\n॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…\n॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…\n॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…\n‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित\nअभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…\nचिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार\nऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…\nसंजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…\nसूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49\nHome » उपलेख, श्यामकांत जहागीरदार, संपादकीय, स्तंभलेखक » बांगलादेशी घुसखोर आणि एनआरसी\nबांगलादेशी घुसखोर आणि एनआरसी\nराष्ट्रीय नागरिकता रजिस्टरच्या (एनआरसी) मुद्याचे राजकारण करण्याचा काँग्रेसचा विशेषत: तृणमूल काँग्रेसचा प्रयत्न निषेधार्ह म्हणावा लागेल. देशाची सुरक्षा आणि आसाममधील जनतेचे घटनादत्त अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी एनआरसी तयार करण्यात आले आहे. मात्र, याचा वापरही काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस आपल्या राजकीय स्वार्थासाठी करत आहे.\nएनआरसीची प्रक्रिया ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने आणि त्यांच्या देखरेखीखालीच राबवली जात आहे, त्यात केंद्रातील सध्याच्या मोदी सरकारचा दूरान्वयानेही संबंध नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी फक्त केंद्र सरकार करत आहे. त्यामुळे या प्रकरणात मोदी सरकारला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा प्रयत्न क्षम्य नाही.\nसंसदेच्या दोन्ही सभागृहांत या मुद्यावरून दोन्ही दिवस जोरदार गोंधळ झाला, राज्यसभेत तर विरोधी सदस्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना बोलू दिले नाही. हा प्रकार अतिशय आक्षेपार्ह आहे. एनआरसीच्या माध्यमातून आसाममधील मूळ रहिवासी असलेल्या जनतेवर अन्याय होत असेल, त्यांना त्यांच्या नागरिकत्वापासून वंचित केले जात असेल, तर त्याविरुद्ध आवाज उठवण्याचा विरोधी पक्षांना निश्‍चितच अधिकार आहे. मात्र, बांगलादेशी घुसखोरांची नावे एनआरसीतून वगळण्याच्या निर्णयाविरुद्ध काँग्रेस विशेषत: तृणमूल काँग्रेस जो थयथयाट करत आहे, तो त्यांना या देशातील एक जबाबदार राजकीय पक्ष म्हणून शोभणारा नाही.\nममता बॅनर्जी यांनी बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्यावरून त्यांनी जी आततायी भूमिका घेतली ती बांगलादेशी घुसखोरांच्या सरळसरळ तुष्टीकरणाची दिसते आहे. एनआरसीतून वगळण्यात आलेल्या ४० लाख लोकांना पश्‍चिम बंगालमध्ये आश्रय देण्याची तयारीही ममता बॅनर्जी यांनी दर्शवली आहे. बॅनर्जी यांनी आपले नाव ममता, असले तरी बांगलादेशी घुसखोरांवर एवढी ममता दाखवण्याचे कारण नाही.\nआपल्या तात्कालिक राजकीय फायद्यासाठी ममता बॅनर्जी याचा उपयोग करून घेत असल्या, तरी यामुळे आज नाही तर उद्या पश्‍चिम बंगालची पर्यायाने देशाची सुरक्षा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. पश्‍चिम बंगालमधील लोकच आपले अधिकार हिरावत असल्यामुळे उद्या या घुसखोरांविरुद्ध आवाज उठवल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणजे कालपर्यंत जे आसाममध्ये झाले ते उद्या पश्‍चिम बंगालमध्ये झाले तर आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. राजकीय नेत्यांनी आणि पक्षांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी काही निर्णय घेणे समजण्यासारखे असले, तरी देशाच्या हिताचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा बळी देऊन ते आपल्या राजकीय फायद्याची पोळी शेकण्याचा प्रयत्न करत असतील, तर या देशातील जनता तो प्रयत्न कधीच खपवून घेणार नाही.\nआसाममधील एनआरसीत ४० लाख लोकांची नावे का वगळण्यात आली, याचा सवार्र्ंनी शांतपणे विचार करण्याची गरज आहे. आपण आसामचे पर्यायाने या देशाचे नागरिक असल्याबाबतचा कोणताही पुरावा या लोकांना एनआरसीसमोर सादर करता आला नाही. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी याच वस्तुस्थितीकडे राज्यसभेत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.\nमुळात आसाममध्ये एनआरसीची स्थापना विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनातून झाली. १९८० च्या दशकात आसाममधील विद्यार्थ्यांनी या घुसखोराविरुद्ध आंदोलन छेडले होते, या घुसखोरांनी मोठ्या संख्येत आसाममध्ये घुसून स्थानिक लोकांच्या घटनादत्त अधिकारावर आक्रमण केले होते. या घुसखोरांमुळे राज्यातील स्थानिक आणि राजकीय समीकरणेही धोक्यात आली होती. आसाममधील विद्यार्थ्यांनी देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी छेडलेले हे आंदोलन होते, या आंदोलनातून तेथील विद्यार्थ्यांना स्वत:चा कोणताही राजकीय स्वार्थ साधायचा नव्हता. या आंदोलनाची परिणती म्हणून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी आसाम करार केला. बांगलादेशी घुसखोरांना आसाममधून हद्दपार करण्याचा निर्धार या करारातून व्यक्त करण्यात आला होता. आसाममधील मूळ नागरिक आणि बांगलादेशी घुसखोर यांना हुडकून काढण्यासाठी एनआरसी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र या एनआरसीची अंमलबजावणी करण्याची हिंमत त्यानंतर केंद्रात आलेल्या काँग्रेसच्या कोणत्याच सरकारने दाखवली नाही. मोदी सरकारने तशी हिंमत दाखवली, तर काँग्रेस पक्ष एनआरसीच्या प्रक्रियेवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत आहे.\nमुळात ज्या ४० लाख लोकांची नावे एनआरसीतून वगळण्यात आली, त्यात काही भारतीय लोकांचाही समावेश असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आपल्या देशातील शासकीय यंत्रणेकडून १०० टक्के अचूकतेची अपेक्षा करता येणार नाही. त्यामुळे अशा लोकांना एनआरसीवर आक्षेप घेण्याचा आणि आपले नाव एनआरसीत समाविष्ट करण्याबाबतचा दावा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यासाठी त्यांना एनआरसीकडे दाद मागण्याचा तसेच एनआरसीत न्याय मिळाला नाही तर परकीय नागरिकता न्यायाधीकरणाकडे धाव घेण्याचाही अधिकार आहे. मात्र, या संधीचा फायदा आसाममधील मूळ रहिवाशांना आणि कोणत्याही कारणाने ज्याचे नाव एनआरसीत समाविष्ट होऊ शकले नाही, त्यांनाच मिळायला हवा.\nएनआरसीची अंतिम यादी तयार झाल्यानंतर ज्या लोकांची नावे त्यात समाविष्ट नाहीत, अशा बांगलादेशी घुसखोरांचे काय करायचे, त्यांना देशाबाहेर काढायचे का, काढायचे असेल तर कुठे पाठवायचे, देशाबाहेर काढायचे नसेल तर देशात त्यांना कोणता दर्जा द्यायचा, याचाही निर्णय आसाम सरकार आणि केंद्र सरकारला घ्यावा लागणार आहे. हा निर्णय वाटतो तितका सोपा नाही, यातून मोठी गुंतागुंत होऊ शकते. त्यामुळे हे सर्व प्रकरण केंद्र सरकारला अतिशय गांभीर्याने आणि जबाबदारीने हाताळावे लागणार आहे.\nबांगलादेशी घुसखोरांची समस्या ही फक्त आसाममध्ये नाही तर देशाच्या अनेक राज्यांतही आहे. राजधानी दिल्लीतही मोठ्या संख्येत बांगलादेशी घुसखोर आहेत. पश्‍चिम बंगाल भाजपाच्या अध्यक्षांनी तर एनआरसीची मागणी केलीच आहे. त्यामुळे आज ना उद्या एनआरसी तयार करण्याची मागणी आणखी काही राज्यांतून झाली तर आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही.\nमुळात घुसखोरीच्या या समस्येकडे हिंदू-मुस्लिम अशा धार्मिक वा जातीयवादी चष्म्यातून पाहणे योग्य नाही. घुसखोर मग तो कोणत्याही धर्माचा असो, त्याच्याकडे घुसखोर म्हणून पाहिले पाहिजे आणि त्यानुसारच त्याच्यावर कारवाई केली तर देशासमोरचे अनेक प्रश्‍न सुटू शकतात. या घटनेकडे आम्ही राजकीय स्वार्थाच्या धार्मिक चष्म्यातून पाहिले तर परिस्थिती चिघळू शकते. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याकडे राजकीय स्वार्थाच्या धार्मिक चष्म्यातून पाहात असल्यामुळे त्यांना यातून गृहयुद्धाचा धोका वाटतो आहे.\nया देशातील संसाधनावर पहिला अधिकार या देशातील मूळ रहिवाशांचा म्हणजे नागरिकांचा आहे. या देशातील नागरिकांचे पोट भरल्यानंतर उरले तर दुसर्‍याला देण्याबाबत विचार करता येईल. मात्र, या देशातील नागरिकांना उपाशी ठेवून घुसखोरांचे पोट भरण्याचा प्रयत्न या देशातील कोणत्याही राजकीय पक्षाने आपल्या राजकीय स्वार्थासाठी केला, तर या देशातील जनता तो कधीही खपवून घेणार नाही. कारण हा देश म्हणजे काही धर्मशाळा नाही, कोणीही केव्हाही आणि कुठूनही यावे आणि या देशातील नागरिकांच्या अधिकारावर अतिक्रमण करावे.\nसर्वात महत्त्वाचे म्हणजे शरणार्थी आणि घुसखोर यात खूप मोठा फरक आहे. शरणार्थ्यांला नाइलाजाने दुसर्‍या देशात आपला जीव वाचवण्यासाठी आश्रय घ्यावा लागतो, तर घुसखोर ठरवून एका पूर्वनियोजित षडयंत्रातून देशात चोरट्या मार्गाने येत असतात. शरणार्थ्याला सरकार आपल्या देशात आश्रय देत असते, तर घुसखोर सरकारची नजर चुकवून येत असतात. कारण घुसखोरामुळे स्थानिक नागरिकांच्या मानवाधिकारासोबत देशाच्या सुरक्षेलाही धोका पोहोचत असतो. त्यामुळे बांगलादेशी घुसखोरांसाठी या देशात जागा नाही\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\nअटल, अढळ आणि अमर…\nपुन्हा एकदा ‘सर्जिकल स्ट्राईक’ करा\nFiled under : उपलेख, श्यामकांत जहागीरदार, संपादकीय, स्तंभलेखक.\nआजपासून फिफा विश्‍वचषकाची जादू\n फुलराणीने दिले २६ वे सुवर्णपदक\nभारताची सुवर्णझळाळी; एकाच दिवशी १७ पदकांची लूट\nतेजस्विनी, अनिश, बजरंगला सुवर्ण\nकुस्तीपटूंना दोन सुवर्णांसह चार पदके\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळात एकाच दिवशी शंभर बळी\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nSAMB on मग न्यायाधीशांसाठी तरी का उभे राहायचे\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nमग न्यायाधीशांसाठी तरी का उभे राहायचे\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\n७/१२ प्रभागाचा : सोलापूर महानगरपालिका निवडणूक २०१७\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (150) आंतरराष्ट्रीय (467) अमेरिका (166) आफ्रिका (7) आशिया (259) ऑस्ट्रेलिया (2) युरोप (32) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (1) ई-पेपर (159) ई-आसमंत (59) ई-मराठवाडा (48) ई-सदाफुली (4) ई-सोलापूर (48) कलाभारत (4) किशोर भारत (2) क्रीडा (20) छायादालन (36) ठळक बातम्या (8) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (886) आसमंत (841) मानसी (10) युवा भरारी (9) विविधा (4) सदाफुली (22) फिचर (16) महाराष्ट्र (435) उ.महाराष्ट्र (3) प.महाराष्ट्र (15) मराठवाडा (5) मुंबई-कोकण (87) विदर्भ (11) सोलापूर (17) रा. स्व. संघ (48) राज्य (738) आंध्र (12) ईशान्य भारत (42) उत्तर प्रदेश (100) ओडिशा (3) कर्नाटक (80) केरळ (31) गुजरात (98) गोवा (11) जम्मू-काश्मीर (94) तामिळनाडू (35) दिल्ली (52) पंजाब-हरयाणा (28) बंगाल (31) बिहार-झारखंड (66) मध्य प्रदेश-छत्तीसगड (21) राजस्थान (21) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,864) अर्थ (76) कृषी (25) नागरी (822) न्यायालय-गुन्हे (262) परराष्ट्र (83) राजकीय (261) वाणिज्य (13) विज्ञान-तंत्रज्ञान (35) संरक्षण (143) संसद (126) सांस्कृतिक (18) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (5) संपादकीय (795) अग्रलेख (382) उपलेख (412) साहित्य (11) स्तंभलेखक (1,031) अजय देशपांडे (34) अपर्णा क्षेमकल्याणी (10) अभय गोखले (25) अविनाश कोल्हे (10) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (29) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (45) डॉ.परीक्षित स. शेवडे (30) डॉ.वाय.मोहितकुमार राव (28) डॉ.सच्चिदानंद शेवडे (28) तरुण विजय (9) दत्ता पंचवाघ (10) दीपक कलढोणे (36) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (3) ब्रि. हेमंत महाजन (55) भाऊ तोरसेकर (111) मल्हार कृष्ण गोखले (52) यमाजी मालकर (35) योगानंद काळे (1) रत्नाकर पिळणकर (27) रमेश पतंगे (11) रविंद्र दाणी (57) ल.त्र्यं. जोशी (19) वसंत काणे (18) श्याम परांडे (20) श्याम पेठकर (55) श्यामकांत जहागीरदार (57) श्रीकांत पवनीकर (10) श्रीनिवास वैद्य (48) सतीष भा. मराठे (6) सुधीर पाठक (6) सुनील कुहीकर (52) सोमनाथ देशमाने (34) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (26)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nMore in उपलेख, श्यामकांत जहागीरदार, संपादकीय, स्तंभलेखक (58 of 1456 articles)\nपुन्हा एकदा ‘सर्जिकल स्ट्राईक’ करा\nअखंड भारताची फाळणी झाल्यावर भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र देश उदयास आले. भारताच्या फाळणीपासूनच पाकिस्तानने भारताशी कायम वैर जपले ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pimpri-news-crowd-bookstores-121476", "date_download": "2018-08-18T08:52:12Z", "digest": "sha1:KK3WMHALU6HBCUD4P2K2AVK6ON7APXEP", "length": 11936, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pimpri news Crowd in bookstores वह्या-पुस्तकांसाठी दुकानांत गर्दी | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 5 जून 2018\nपिंपरी - सीबीएसई पॅटर्नच्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी, मराठी आणि इंग्रजी माध्यमातील बहुतांश शाळा १५ जूनपासून सुरू होत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत.\nपिंपरी - सीबीएसई पॅटर्नच्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी, मराठी आणि इंग्रजी माध्यमातील बहुतांश शाळा १५ जूनपासून सुरू होत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत.\nपाठ्यपुस्तके, वह्या, स्कूल बॅग, छत्री, रेनकोट, कंपास पेटी, लंच बॉक्‍स, पाण्याची बॉटल, स्केच पेन, एक्‍झाम पॅड अशा शाळेशी निगडित वस्तूंच्या खरेदीसाठी पालक व विद्यार्थ्यांनी रविवारी (ता. ३) दुकानांमध्ये गर्दी केली होती. यंदा पहिली व आठवीचा अभ्यासक्रम बदलल्याने बाजारात ही पुस्तके दाखल झालेली नाहीत, असे प्रिन्स स्टेशनरीचे दिनेश रिजवानी यांनी सांगितले.\nपेन्सिल, खोडरबर, शार्पनर, स्केल असे एकत्रित साहित्याचे संच अनेक दुकान, मॉलमध्ये उपलब्ध आहेत. अर्धा डझनापासून हे संच सुरू होतात. यातही वेगळेपण आणण्याचा प्रयत्न विक्रेत्यांनी केला आहे. काही कंपन्यांनी असे संच बाजारात आणले आहेत. त्याची किंमत ६० पासून साडेतीनशे रुपयांपर्यंत आहे.\nपुस्तकांचा संच व दर\nइयत्ता दुसरी ते पाचवी - २५० रुपये\nसहावी व सातवी -४०० रुपये\nनववी : ५५० रुपये\nदहावी : ६१५ रुपये\nदोनशे पानी - ३८० ते ४२०\nए-फोर आकारातील - ३६० ते ६६०\nशंभर पानी - १८०\nछत्री - १५० ते १५०० रुपये\nपाण्याची बाटली - ५० ते १६०\nजेवणाचा डबा - ५० ते २५०\nरेनकोट - १५० ते ४०० रुपये\nचिंचवडमध्ये रविवारी रंगणार महिला प्रेरणा संमेलन\nवाल्हेकरवाडी - स्वयंसिद्धा प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड शहर) आणि प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि. 19 ऑगस्ट) चिंचवड...\nडिजिटायझेशन'ने दुर्मिळ ग्रंथही चिरकाल \nजळगाव ः पुस्तकांचा खजिना सांभाळणाऱ्या अनेक वाचनालयांना शतकोत्तरी परंपरा लाभलेली आहे. परंतु काळानुरूप ग्रंथालयांनी तंत्रज्ञानाशी जुळवून, त्या दिशेने...\nउज्ज्वल भवितव्याची जबाबदारी सर्वांची - पवार\nपुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित...\nज्येष्ठ विचारवंत प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर यांचे निधन\nसोलापूर - ज्येष्ठ विचारवंत, लेखक प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर (वय 82) यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी (ता....\nमिरज - कोल्हापूर लोहमार्गाचे विद्युतीकरण गतीने\nमिरज - मिरज ते कोल्हापूर लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम गतीने सुरु झाले आहे. जयसिंगपूरपर्यंत खांब उभे झाले आहेत. पुढे कोल्हापूरपर्यंत काम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://punerispeaks.com/2019-cricket-world-cup-timetable/", "date_download": "2018-08-18T08:40:56Z", "digest": "sha1:KPX6EX36UE372RL2A2YRGI2WPTSWTG2Q", "length": 8696, "nlines": 134, "source_domain": "punerispeaks.com", "title": "2019 क्रिकेट वर्ल्ड कप संपूर्ण वेळापत्रक पहा | PuneriSpeaks", "raw_content": "\n2019 क्रिकेट वर्ल्ड कप संपूर्ण वेळापत्रक पहा…\n2019 क्रिकेट वर्ल्ड कप संपूर्ण वेळापत्रक\n2019 क्रिकेट वर्ल्ड कप ला बरोबर एक वर्ष बाकी आहे. सामने 30 मे ते 15 जुलैपर्यंत खेळवण्यात येणार आहेत. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान अशा या 10 देशांमध्ये 2019 क्रिकेट वर्ल्ड कप रंगणार आहे.\n2019 क्रिकेट वर्ल्ड कप वेळापत्रक\n▫ 30 मे : इंग्लंड Vs दक्षिण आफ्रिका\n▪ 31 मे : विंडीज Vs पाकिस्तान\n▫ 1 जून : न्यूझीलंड Vs श्रीलंका\n▪ 1 जून : अफगाणिस्तान Vs ऑस्ट्रेलिया\n▫ 2 जून : दक्षिण आफ्रिका Vs बांगलादेश\n▪ 3 जून : इंग्लंड Vs पाकिस्तान\n▫ 4 जून : अफगाणिस्तान Vs श्रीलंका\n▪ 5 जून : दक्षिण आफ्रिका Vs भारत\n▫ 5 जून : बांगलादेश Vs न्यूझीलंड\n▪ 6 जून : ऑस्ट्रेलिया Vs विंडीज\n▫ 7 जून : पाकिस्तान Vs श्रीलंका\n▪ 8 जून : इंग्लंड Vs बांगलादेश\n▫ 8 जून : अफगाणिस्तान Vs न्यूझीलंड\n▪ 9 जून : भारत Vs ऑस्ट्रेलिया\n▫ 10 जून : दक्षिण आफ्रिका Vs विंडीज\n▪ 11 जून : बांगलादेश Vs श्रीलंका\n▫ 12 जून : ऑस्ट्रेलिया Vs पाकिस्तान\n▪ 13 जून : भारत Vs न्यूझीलंड\n▫ 14 जून : इंग्लंड Vs विंडीज\n▪ 15 जून : श्रीलंका Vs ऑस्ट्रेलिया\n▫ 15 जून : दक्षिण आफ्रिका Vs अफगाणिस्तान\n▪ 16 जून : भारत Vs पाकिस्तान\n▫ 17 जून : विंडीज Vs बांगलादेश\n▪ 18 जून : इंग्लंड Vs अफगाणिस्तान\n▫ 19 जून : न्यूझीलंड Vs दक्षिण आफ्रिका\n▪ 20 जून : ऑस्ट्रेलिया Vs बांगलादेश\n▫ 21 जून : इंग्लंड Vs श्रीलंका\n▪ 22 जून : विंडीज Vs न्यूझीलंड\n▫ 22 जून : भारत Vs अफगाणिस्तान\n▪ 23 जून : पाकिस्तान Vs दक्षिण आफ्रिका\n▫ 24 जून : बांगलादेश Vs अफगाणिस्तान\n▪ 25 जून : इंग्लंड Vs ऑस्ट्रेलिया\n▫ 26 जून : न्यूझीलंड Vs पाकिस्तान\n▪ 27 जून : भारत Vs विंडिज\n▫ 28 जून : श्रीलंका Vs दक्षिण आफ्रिका\n▫ 29 जून : न्यूझीलंड Vs ऑस्ट्रेलिया\n▪ 29 जून : पाकिस्तान Vs अफगाणिस्तान\n▫ 30 जून : इंग्लंड Vs भारत\n▪ 1 जुलै : श्रीलंका Vs विंडीज\n▫ 2 जुलै : बांगलादेश Vs भारत\n▪ 3 जुलै : इंग्लंड Vs न्यूझीलंड\n▫ 4 जुलै : अफगाणिस्तान Vs विंडीज\n▪ 5 जुलै : पाकिस्तान Vs बांगलादेश\n▫ 6 जुलै : श्रीलंका Vs भारत\n▪ 6 जुलै : ऑस्ट्रेलिया Vs दक्षिण आफ्रिका\n▫ 9 जुलै : पहिला उपांत्य सामना (1 विरुद्ध 4)\n▪ 11 जुलै : दुसरा उपांत्य अंतिम सामना (2 विरुद्ध 3)\n▫ 14 जुलै : फायनल\nतर असे सामने रंगणार असून 2019 क्रिकेट वर्ल्ड कप कोण जिंकणार हे बघावे लागेल, आपल्याला कोण जिंकेल असे वाटते\nअपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.\nशेतकरी चोर आणि बेईमान आहेत, त्यांना चपलेने मारलं पाहिजे; भाजप नेते हकम सिंह अनजाना यांचे वादग्रस्त विधान\nइंधन दरवाढीला विरोध करण्यासाठी ब्राझीलच्या ट्रकवाल्यांनी लढवली नामी शक्कल, सरकारची आणीबाणीची घोषणा\n2019 क्रिकेट वर्ल्ड कप\n2019 क्रिकेट वर्ल्ड कप वेळापत्रक\nPrevious articleइंटरनेटवर धुमाकुळ माजवणारे वायरल नृत्यक कोण\nNext articleAmruta Fadnavis Troll: अमृता फडणवीस यांनी पर्यावरण दिनानिमित्त केलेल्या ट्विटवर ट्विटरवासीयांनी केले ट्रोल\nAsian Games 2018: आशियाई क्रीडा स्पर्धा वेळापत्रक, प्रक्षेपण, कबड्डी संघ वेळापत्रक\nपिंपरीत प्रियकराने ‘Shivde, I Am Sorry’ चे ३०० फलक लावले, कोण आहे शिवडे\nअटल बिहारी वाजपेयी माहिती, अटल बिहारी वाजपेयी विशेष , अटल बिहारी वाजपेयी मराठी, अटल बिहारी वाजपेयी कविता\nपुणे तिथे काय उणे: देशात राहण्यासाठी पुणे शहर अव्वल स्थानी\nआरक्षण – एक शोधनिबंध | आरक्षण माहिती | आरक्षण म्हणजे काय\nRaj Thackeray VS Ajit Pawar: पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळ्यात एकमेकांवर टीका, वॉटरकप 2018 विजेते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://swarnim-sakhi.blogspot.com/2011/06/going-live-d.html", "date_download": "2018-08-18T08:18:17Z", "digest": "sha1:QL4XNKZYNH4EA35AIFJVA36EAYLKQ5ZW", "length": 7693, "nlines": 104, "source_domain": "swarnim-sakhi.blogspot.com", "title": "Swarnim Sakhi...: Going live :D", "raw_content": "\nअर्ध्य धन्यवादाचे पुन्हा एकदा ... तुम्हा सारयांसाठी ...तुमच्या ओंजळ ओंजळ प्रेमासाठी ...\nकालिंदीच्या ओघात अजून एक धारा ... राधेसाठी.. अंतरीच्या उर्मींसाठी ...\nवपू नी लिहिले होते मागे... धारेच्या विरुद्ध जाते ती राधा..\nही राधा मात्र असेल .. स्वत:चा शोध घेत... अखंड ...\n अन इथे सख्य असेल ते जे जे उत्तम उदात्त सुंदर अश्या सारया हृद्य गोष्टींचे .. कविता... लेख... पुस्तक.. फोटो .. रंग ... रेषा... उकार ..वेलांट्या.. जगण्यातल्या चिमुकल्या क्षणांचे .. मनस्वी नात्यांच्या इंद्रधनुषी गोफांचे.. लडीवाळपणे भवती भवती फेर धरणारया आठवणींचे ... अन अंतरी कस्तुरी सारख्या दरवळणारया मैत्रीचे ... किंवा अगदी पायी टोचणारया काट्याचे .. नि पदर ओढत ओरखडे देणाऱ्या निवडुंगाचे सुद्धा .. या सारया गोष्टींचे सख्य आहे.. म्हणून सखी आहे ...\nतुमचे सुद्धा होते का असेच...\nये कैसा सवाल ..\nकाय पाठवू म्हणे ...\nरोज की तरह आ गयी वो... रोज की तरह बच्चा देखता रहा अपनी भूरी आँखे भरके... हाथ उठाये ... दिल भरमाये ... रोज की तरह ... फिर एक बार आस लगा...\nपावसात भिजलेले तन मन माझे उगीचच रुसण्याचे बहाणे हे तुझे क्षणार्धात विरतील दुराव्याचे ढग एकदाच परतुनी माझ्याकडे बघ ... ...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ७\nदिवस सातवा हाही दिवस असाच पहाटे उठतो... आधी गणपतीची रूप डोळ्यात रेखून... मग बाकी काम चालू करतो.. सकाळीच पूजा, आरती करून शेजारया...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग 5\nदिवस पाचवा.. हा दिवस गाजवत येतो तयारी हरतालिकेची अन गणपतीची .. सुरु होतो तोच वाजत गाजत .. पुन्हा एकदा वारी बाजाराची... तयारी हरतालिकेच...\nA Walk In Cloud.... गत वर्षीची कोजागिरी अशी जगजीत सिंगजींच्या गझलेत चिंब भिजलेली होती... \"हाथ छुटे भी तो रिश्ते नाही तोडा करते\" ...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ३\nदिवस तिसरा हा दिवस शुभ्र सकाळचा... किलबिल पक्ष्यांच्या आवाजाने जागा होणारा... शेजारच्या गोठ्यातल्या गाईच्या घुंगुरवाळा आवाजाचा... ...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ४\nदिवस चौथा हा दिवस तसा आरामाचा... सुशेगात उठण्याचा... कामाची घाई विसरून चहा पार्टी करण्याचा.. तळ्याच्या काठावर बसून शांत...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ६\nदिवस सहावा... अन मग हा उत्सवी दिवस उजाडतो भल्या पहाटेच... मूर्ती स्थानापन्न होते सजवलेल्या माटीच्या मखरात...मागे रंगवलेले चित्र आत...\nपदर ... नक्षीदार पदर ... रेशमी साडीचा...बुट्टीदार काठाचा .. जरतारीच्या मोराचा वयात येताना आपसूकच चापून-चोपून खांद्यावर विसावलेला... सौभ...\nहृद्य वाचकगण - Followers\nकविता (27) तुमचे सुद्धा होते का असेच (14) सखी (10) मैं (9) भक्ती (3) गोकुळ (2) होकार (2) निळा शाम (1) निळाई (1) भूल (1)\nशेअर विथ केअर :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/celebrities/dhanashri-kadgaonkar", "date_download": "2018-08-18T08:18:56Z", "digest": "sha1:D5V6IAOW3LXBB7L6X3YG7KGOCSXSDXPY", "length": 2002, "nlines": 42, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Dhanashri Kadgaonkar | Marathi Dhamaal", "raw_content": "\nउंची: 0 फूट 5 इंच (0'5\")\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation राधिका, श्रिया नंतर ‘कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुन’ मध्ये कोणाचा नंबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/trying-districy-hagandari-free-35155", "date_download": "2018-08-18T08:34:32Z", "digest": "sha1:7MIVIRMOEVN3USFQIMJM7YW5MELQTTDF", "length": 15662, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "trying to districy hagandari free जिल्हा हगणदारी मुक्तीसाठी प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nजिल्हा हगणदारी मुक्तीसाठी प्रयत्न\nबुधवार, 15 मार्च 2017\nजिल्हाधिकारी निंबाळकर; चौपदरीकरणाच्या कामास गती देणार\nजळगाव - जिल्ह्याचा विकास करण्यासाठीच मी आलो आहे. सर्वांगीण विकास कसा करता येईल, यासाठी आधी जिल्ह्याची माहिती घेत आहे. तूर्तास महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामात लक्ष घालून महामार्ग लवकरात लवकर होण्यावर भर देईल. तसेच जिल्हा २०१८ पर्यंत हगणदारीमुक्त, स्वच्छ जिल्हा निर्माण करण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती आज नवे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी आज येथे दिली.\nश्री. निंबाळकर यांनी आज पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर सायंकाळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.\nजिल्हाधिकारी निंबाळकर; चौपदरीकरणाच्या कामास गती देणार\nजळगाव - जिल्ह्याचा विकास करण्यासाठीच मी आलो आहे. सर्वांगीण विकास कसा करता येईल, यासाठी आधी जिल्ह्याची माहिती घेत आहे. तूर्तास महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामात लक्ष घालून महामार्ग लवकरात लवकर होण्यावर भर देईल. तसेच जिल्हा २०१८ पर्यंत हगणदारीमुक्त, स्वच्छ जिल्हा निर्माण करण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती आज नवे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी आज येथे दिली.\nश्री. निंबाळकर यांनी आज पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर सायंकाळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.\nते म्हणाले, की प्रत्येकाला घर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यासाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लक्षांक देण्यात आला आहे, तो पूर्ण करण्याकडे कल राहील. मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत रखडलेल्या पाणी योजना पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते पूर्ण करण्यात येतील. लोकराज्यच्या पोर्टलवर नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारी लागलीच सोडविण्याकडे आपण लक्ष दिले जाईल. जिल्ह्यातील आदिवासी भागातील पाड्यांची रचनात्मक आखणी करून त्यांना गावांचा दर्जा ‘पेसा’ योजनेंतर्गत देण्यात येईल.\nसर्व्हर डाऊन असल्याने जिल्ह्यातील ७/१२ संगणकीकरणाचे काम रखडले होते, ते आता सुरू झाले आहे. मेअखेरपर्यंत सर्व ७/१२ उतारे संगणकीकृत होतील. तशा सूचना तलाठी, मंडळाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्ह्यात महसूल वसुलीवर भर दिला जाईल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले वाळूचे ठेके कंत्राटदार का घेत नाहीत, त्याकडे लक्ष देवून वाळू ठेक्‍याचा प्रश्‍न सोडविला जाईल, असेही श्री. निंबाळकर यांनी स्पष्ट केले.\nजिल्हाधिकारी म्हणाले, की जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यावर भर जाईल. शाळांच्या इमारती, तेथील सोईंकडे लक्ष दिले जाईल. सर्वच शाळांचे डिजिटलायझेशन केले जाईल. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. ज्या ठिकाणी पाणी टंचाई भासेल, अशा ठिकाणी टॅंकर सुरू करून इतर योजना राबविल्या जातील. जळगाव जिल्हा हगणदारीमुक्त, स्वच्छ जिल्हा कसा होईल याकडे विशेष लक्ष असेल.\nश्री. निंबाळकर यांनी सांगितले, की विकासासाठी एक ‘टीमवर्क’ लागते. ‘टीमवर्क’शिवाय विकास कसा होईल जिल्ह्यातील महसूल विभागाच्या टीमला ‘गिअरअप’ करावे लागेल. संबंधित अधिकाऱ्यांना लिडरशीप देवून ‘बूस्ट’ देवू. ठरविलेले काम होण्यासाठी ते शेवटच्या कर्मचाऱ्यांपर्यंत योग्य प्रकारे पोचले, तरच ते तडीस जाईल. यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील यशस्वी संवादावर भर दिला जाणार आहे.\nसंग्रामपूर : वाण धरण ६५ टक्के भरले\nसंग्रामपूर : सातपुडा पर्वतामधील तीन जिल्ह्यांसाठी जलसंजीवनी ठरलेले वाण धरण 65 टक्के भरले आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या ...\nबारामती - विद्या प्रतिष्ठानच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पुरस्कार\nबारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून सहाजण जखमी\nबेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने बंगळूरकडे जाणारी व्हीआरएलची आराम बस उलटून चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/domicile-certificate-not-mandatory-onwards/", "date_download": "2018-08-18T09:13:31Z", "digest": "sha1:3LQ6HPH5BITSHMNT3V5XOIQOIUXCHWFK", "length": 8359, "nlines": 141, "source_domain": "www.marathimati.net", "title": "आता डोमिसाइल सर्टिफिकेटची सक्ती नाही | Domicile Certificate Not Mandatory Onwards", "raw_content": "\nआता डोमिसाइल सर्टिफिकेटची सक्ती नाही\nमहाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट, फार्मसी, आर्किटेक्चर आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाइल सर्टिफिकेटची सक्ती करण्यात आलेली नाही. ९ जानेवारीला काढलेल्या अधिसूचनेत तंत्रशिक्षण संचालनालयाने नमूद केले आहे की, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्त्वाचे कागदपत्र म्हणून डोमिसाइल सर्टिफिकेट लावणे आवश्यक होते. पण आता ते नसेल तर, जन्मतारखेचा दाखला (बर्थ सर्टिफिकेट) किंवा शाळा सोडल्याचा दाखला (लीव्हिंग सर्टिफिकेट) सादर करता येईल. या अधिसूचनेत हे ही स्पष्ट करण्यात आले आहे की महाराष्ट्रात जन्म झाल्याचा स्पष्ट उल्लेख बर्थ आणि डोमिसाइल सर्टिफिकेटवर असणे जरुरीचे आहे. या सूचनेचा स्पष्ट उल्लेख इंजिनीअरिंग अभ्यासक्रमासाठी www.dte.org.in या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या माहितीपुस्तकाच्या पान क्रमांक १६ वर केला आहे. वेबसाईटवर या अधिसूचनेची प्रत आहे.\nडोमिसाइल सर्टिफिकेटबरोबरच इतर आवश्यक कागदपत्रांच्या यादीमध्ये (राखीव गटांतील उमेदवारांकरता) जात प्रमाणपत्र, नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्रांचाही संबंधित अधिसूचनेत समावेश आहे. या अधिसूचनेत हे ही म्हटले आहे की, इतर आवश्यक कागदपत्रांबरोबर ही कागदपत्रे प्रवेश अर्ज स्वीकृतीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.\nया वर्गातील आणखी काही लेख\nऑनलाईन प्रवेशाची तारीख २० जून\nमहाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ\nThis entry was posted in घडामोडी and tagged इंजिनीअरिंग, डोमिसाइल सर्टिफिकेट, तंत्रशिक्षण संचालनालय, प्रमाणपत्र, महाराष्ट्र on जुन 15, 2012 by विराज काटदरे.\n← आम्हा मनी विठ्ठलु ध्यानी विठ्ठलु ऑनलाईन प्रवेशाची तारीख २० जून →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.vsagar.org/marathi-mcu-1/", "date_download": "2018-08-18T08:41:41Z", "digest": "sha1:7T6ZN2PLFL6QKGBAURL4MGWDZ7OLVTPF", "length": 13582, "nlines": 112, "source_domain": "www.vsagar.org", "title": "मराठीतून मायक्रोकंट्रोलर शिका – १ – Vidyasagar Academy", "raw_content": "\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – १\nThis post is part of the series मराठीतून मायक्रोकंट्रोलर प्रोग्रामिंग शिका\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – १ (Current)\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – २\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – ३\nसर्वांसाठी अतिशय सोप्या भाषेत मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिकण्यासाठी विद्यासागर सरांनी चालू केलेला हा उपक्रम. आपला अभिप्राय अवश्य कळवा.\n८०५१ मायक्रोकंट्रोलर हा शिकण्यास अतिशय सोपा आहे, पण त्यासाठी आपल्याला काही महत्वाच्या मूलभूत गोष्टी शिकणे आवश्यक आहे.\nया मायक्रो कंट्रोलरची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत:\nAT89S51 ची मेमरी आहे 4Kbyte – अधिक माहिती\nAT89S52 ची मेमरी आहे 8Kbyte – अधिक माहिती\n८०५१ मायक्रोकंट्रोलरच्या theory बाबत जास्त खोलात जाणे हा या उपक्रमाचा उद्देश नाही. आपल्याला लवकरात लवकर ८०५१ मायक्रोकंट्रोलरचे बेसिक प्रोग्रामिंग कसे करता येईल, या गोष्टीवर आपण भर देणार आहोत.\nतेव्हा मित्रांनो, चला तर आपण आता सुरु करूया…\nसुरुवातीला आपण ८०५१ मायक्रोकंट्रोलरचे अंतर्गत स्वरूप (internal structure) समजावून घेऊ. खाली दिलेली आकृती पहा.\n८०५१ मायक्रोकंट्रोलरचे अंतर्गत स्वरूप\nवरील diagram मध्ये ८०५१ मायक्रोकंट्रोलरच्या समूहातील AT89S52 या मायक्रो कंट्रोलर चे pin configuration दाखविले आहे.\nखालून डावीकडील पहिली पिन आहे पिन-१. असेच आपण पुढे मोजत गेलो कि खालची उजवीकडील पिन आहे पिन-२०. तेथूनच मग वर गेलो कि पिन-२१ आणि तेथून डावीकडे मोजत गेलो की शेवटची पिन आहे, पीन-४०.\nअशा प्रकारे या मायक्रो कंट्रोलर ला ४० पिन्स आहेत.\n८०५१ मायक्रो कंट्रोलरचा डेव्हलपमेंट बोर्ड असा दिसतो\nआता ८०५१ मायक्रो कंट्रोलर चे प्रोग्रामिंग आणि त्या अनुषंगाने रोबोटिक्स शिकण्यासाठी आपल्याला यातील फक्त ३२ पिन्स लक्षात ठेवायच्या आहेत. या ३२ पिन्स चे चार भाग आहेत: PORT-0 (पोर्ट झिरो), PORT-1 (पोर्ट वन), PORT-2 (पोर्ट टू) आणि PORT-3 (पोर्ट थ्री).\nया प्रत्येक पोर्ट मध्ये ८ पिन्स आहेत. प्रत्येक पिन चा एक विशिष्ट नंबर आहे, तो कसा वाचायचा आणि अनुक्रमे लक्षात ठेवायचा ते आता पाहू.\nवरील diagram पुन्हा नीट पहा.\nप्रत्येक पिन समोर त्या पिनचा क्रमांक आणि त्याखाली फंक्शन लिहिले आहे. सध्या आपल्याला प्रत्येक पिन चा फक्त नंबरच लक्षात ठेवावयाचा आहे. जसे –\nपिन नंबर १ आहे – P0.0 किंवा P0^0.\nप्रत्येक पिन चा नंबर वाचताना असा वाचा – पी झिरो डॉट झिरो किंवा पी झिरो कॅप झिरो.\nयाप्रमाणे पुढची पिन आहे पिन नंबर २, म्हणजेच P0.1 किंवा P0^1 अर्थात पी झिरो डॉट वन किंवा पी झिरो कॅप वन.\nअशा प्रकारे आपल्याला ३२ पिन्स चे नंबर्स लक्षात ठेवायचे आहेत आणि तेही अनुक्रमाने… सोपे आहे, नाही का…\nम्हणजे मी जर तुम्हाला विचारले कि P1^3 हि कोणती पिन आहे तर तुम्हाला ती वाचता आली पाहिजे, तिचा पोर्ट मधील अनुक्रमांक काय आणि ती कोणत्या पोर्ट मध्ये आहे ते सांगता आले पाहिजे…\nजसे P1^3 हि पिन PORT1 मधील चवथी पिन आहे. P3^4 हि पिन PORT3 मधील पाचवी पिन आहे, वगैरे…\n आता पुढील भाग पहा…\nI/O PORT (आय-ओ पोर्ट) म्हणजे काय\nमायक्रो कंट्रोलर मधील या ३२ पिन्स पैकी प्रत्येक पिन ला I/O (आय/ओ पिन) असे म्हणतात. आय ओ पिन म्हणजे इनपुट आउटपुट पिन. अर्थात आपण यातील कोणत्याही पिन वरून, मायक्रो कंट्रोलर च्या आतून बाहेरच्या जगात आउटपुट पाठवू शकतो किंवा बाहेरून मायक्रो कंट्रोलर च्या आत इनपुट घेऊ शकतो.\nयातील कोणत्या पिन ला इनपुट किंवा आउटपुट पिन बनवायचे, हे आपण आपल्या प्रोग्राममध्ये, विशिष्ट प्रकारे कोडिंग करून ठरवू शकतो. ते कशा प्रकारे करायचे हे आपण नंतर पाहणारच आहोत. त्याकरिता आपल्याला पुढील धड्यामध्ये लँगवेजचे बेसिक शिकायचे आहे.\n तर मग पुढील धड्याची वाट पहा…\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – २\nमराठीतून मायक्रोकंट्रोलर, अतिशय छान प्रयत्न आहे सर, ह्यामूळे केवळ इंग्लिश मिडीयम च नव्हे तर मराठी मिडीयम चे मुले सुद्धा शिकू पाहतील व नक्कीच साधारण मुलांना सुद्धा अशा सोप्या पद्धतीने शिकता येईल.\nअतिशय उत्कृष्ट उपक्रमाला मनापासून शुभेच्छा.\nवर्ग 12 चे पहिले वर्ष कसे बसे निघाले आता परत वर्ग 12 चे कसे करावे ही भिती मनात होती पण आता तुमच्या मुळे confidence आला व वाटणारी अनावश्यक भिती नाहिसी झाली धन्यवाद\nहे पोस्ट सुद्धा वाचा सर.\nखूप खूप धन्यवाद सर\nमराठीतून मायक्रोकंट्रोलर, अतिशय छान प्रयत्न आहे सर, ह्यामूळे केवळ इंग्लिश मिडीयम च नव्हे तर मराठी मिडीयम चे मुले सुद्धा शिकू पाहतील व नक्कीच साधारण मुलांना सुद्धा अशा सोप्या पद्धतीने शिकता येईल.\nअतिशय उत्कृष्ट उपक्रमाला मनापासून शुभेच्छा.\nसर आपण 8051 pin config.मधील 32 pins लक्षात ठेवण्याचे टेक्निक इतक्या सहज सोप्या शब्दात स्पष्ट केले आहे की 8051 ,C Lang.,व Opert. system या lessons साठी मनात असलेली भिती आत्तापासूनच निघुन गेली.खुप खुप धन्यवाद सर.\nमी लवकरच नवीन धडा प्रकाशित करीत आहे.\nसर आपले लिखान समजायला खूप सोपे आहे. त्यामुळे नविन विषयाची भीती निघून जाते. आपले सर्व धडे वाचायची आतूरता झाली आहे. Keep it up\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://punerispeaks.com/tag/amruta-fadnavis/", "date_download": "2018-08-18T08:39:00Z", "digest": "sha1:KFQA57AH4PY52AWGT43MIAI4DWUCR4HU", "length": 2825, "nlines": 59, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Amruta fadnavis Archives - Puneri Speaks", "raw_content": "\nAmruta Fadnavis Troll: अमृता फडणवीस यांनी पर्यावरण दिनानिमित्त केलेल्या ट्विटवर ट्विटरवासीयांनी केले ट्रोल\nAmruta Fadnavis Troll जागतिक पर्यावरण दिन निमित्त शुभेच्छा देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना पुन्हा एकदा सोशल … Read More “Amruta Fadnavis Troll: अमृता फडणवीस यांनी पर्यावरण दिनानिमित्त केलेल्या ट्विटवर ट्विटरवासीयांनी केले ट्रोल”\nAsian Games 2018: आशियाई क्रीडा स्पर्धा वेळापत्रक, प्रक्षेपण, कबड्डी संघ वेळापत्रक\nपिंपरीत प्रियकराने ‘Shivde, I Am Sorry’ चे ३०० फलक लावले, कोण आहे शिवडे\nअटल बिहारी वाजपेयी माहिती, अटल बिहारी वाजपेयी विशेष , अटल बिहारी वाजपेयी मराठी, अटल बिहारी वाजपेयी कविता\nपुणे तिथे काय उणे: देशात राहण्यासाठी पुणे शहर अव्वल स्थानी\nआरक्षण – एक शोधनिबंध | आरक्षण माहिती | आरक्षण म्हणजे काय\nRaj Thackeray VS Ajit Pawar: पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळ्यात एकमेकांवर टीका, वॉटरकप 2018 विजेते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%A8", "date_download": "2018-08-18T09:00:02Z", "digest": "sha1:ABPYUM3QU75VJ4CTJG4CLBMN4EBFULUK", "length": 4207, "nlines": 143, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:लिस्बन - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या वर्गासाठी मुख्य लेखः लिस्बन.\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१४ रोजी १०:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-18T09:07:33Z", "digest": "sha1:EBTLWMGIUY5SYKLQVBILDPE6H66RFWUN", "length": 2725, "nlines": 61, "source_domain": "m4marathi.com", "title": "आजीबाई आणि कंडक्टर | m4marathi", "raw_content": "\nएक म्हातारी बाई रोज बसने देवळात जायची. ती ज्या बसने जायची त्या बस कंडक्टरला रोज बदाम, काजू खायला द्यायची.\nएके दिवशी कंडक्टरने म्हातार्‍या बाईला विचारले की आजी मला रोज काजू ,बदाम खायला का देतेस\nम्हातारी बाई म्हणाली, ‘बेटा आता मी म्हातारी झाली आहे आणि त्यामुळे दात पण पडलेत, काजू, बदाम नुसते चघळून फेकून देणं चांगलं नाहीना.\nबाई (teacher) आणि मुले\nरजनीकांतचा मुलगा आणि मकरंदचा मुलगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=206&Itemid=398&limitstart=2", "date_download": "2018-08-18T08:15:43Z", "digest": "sha1:DW37OXFGVJE4I6FYCIPJ2BR3J34PNXFJ", "length": 6607, "nlines": 38, "source_domain": "saneguruji.net", "title": "आवडती नावडती", "raw_content": "शनिवार, आँगस्ट 18, 2018\nकोठून आले ते शब्द अनाथांचा नाथ, दीनांचा कैवारी असा कोण तेथे होता अनाथांचा नाथ, दीनांचा कैवारी असा कोण तेथे होता तेथे एक साधू राहात असे. बाईच्या हावभावांवरून ती जीव देणार असे त्याने ओळखले. त्याचेच ते शब्द होते. ते शब्द ऐकून नावडती चपापली, दचकली. हे जग मला नीट जगूही देत नाही, सुखाने मरूही देत नाही. दुष्ट आहे जग असे तिला वाटले.\nतो साधू जवळ आला. तो प्रेमळपणे बाईला म्हणाला, 'तुम्ही जीव का देता देवाने दिलेला सोन्यासारखा देह का बरे पाण्यात फेकता देवाने दिलेला सोन्यासारखा देह का बरे पाण्यात फेकता हा देह सेवेत राबवावा, परोपकारात झिजवावा, आत्महत्या म्हणजे सर्वांत मोठे पाप नका असा अविवेक करू नका माझे ऐका.'\nनावडती म्हणाली, 'महाराज, तुम्ही म्हणता ते खरे. आत्महत्या करणे हे मोठे पाप म्हणून तर आजपर्यंत थांबले; परंतु अत:पर थांबवत नाही, धीर धरवत नाही. कशाच्या आशेवर मी जगू, जगात दिवस काढू प्रेमाचा एक शब्द मला मिळत नाही. मरू दे मला. मी मेले तर कोणी रडणार नाही. मरणाचे सुख तरी मिळू दे मला.'\nसाधू म्हणाला, 'कसले तुम्हाला दु:ख आहे\nनावडती म्हणाली, 'मी आहे नावडती. आवडतीचे सारे गोड. माझे सारे कडू. देवाने रूपलावण्य नाही मला दिले. यात माझा काय दोष परंतु म्हणून मला छळतात, गांजतात; वाटेल तसे बोलतात. हाल करतात. कुरूप स्त्रीने कशाला जगावे परंतु म्हणून मला छळतात, गांजतात; वाटेल तसे बोलतात. हाल करतात. कुरूप स्त्रीने कशाला जगावे देव फुलांना, फुलपाखरांना कसे नटवता; परंतु माझ्याच वेळी त्याचं सारं संपलं वाटतं. असो. आपले नशीब. जाऊ दे मला, घेऊ दे उडी.'\nसाधू म्हणाला, थांब. नको उडी घेऊ. मी तुला रूपलावण्य देतो. देवाचे नाव घेऊन या पाण्यात तीन वेळा बुचकळून बाहेर ये. अप्सरेप्रमाणे दिसू लागशील. खरेच सांगतो.\nनावडतीने विश्वास ठेवला. साधूला तिले नमस्कार केला. साधू निघून गेला नंतर तिने देवाचे नाव घेऊन तीन वेळा पाण्यात बुचकुळी मारली आणि खरेच ती फार सुंदर दिसू लागली. जणू राजाची राणी. स्वर्गातील रंभा अशी दिसू लागली.\nती घरी परत जावयास निघाली. मनात साधूचे उपकार मानीत, त्याची स्तुती गात ती निघाली. आपला नवरा आता आपल्यावर प्रेम करील, हिडिसफिडिस करणार नाही असे मनात येऊन तिला किती तरी आनंद होत होता. संपली साडेसाती असे तिला वाटले. तिला आता दगड टुपत नव्हते, काटे बोचत नव्हते. जणू पायाखाली सर्वत्र फुलेच पसरली होती.\nपुन्हा ते जंगल आले. त्या जंगलातून ती जात होती. वेगाने जात होती. इतक्यात 'अहो बाई, थांबा, इकडे या.’ असे शब्द तिच्या कानांवर आले आजूबाजूस कोणी माणूस तर दिसेना. कोणी मारली हाक, कोणाचे ते शब्द भ्रम झाला असाव असे मनात येऊन ती पुन्हा चालू लागली परंतु ते शब्द पुन्हा कानांवर आले. भास नाही, कोणी तरी खास बोलावते आहे असे तिला वाटले. तोच तिला ते पेरूचे झाड दिसले. ते झाड जणू आनंदाने डोलत होते. नावडती त्याच्या जवळ गेली व म्हणाली, 'काय रे पेरूच्या झाडा, तू का हाक मारलीस\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/dhing-tang-article-52416", "date_download": "2018-08-18T08:23:55Z", "digest": "sha1:AWH2UQAF6GZ5WGRXPOLKYOA3SKWSGQ34", "length": 15430, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "dhing tang article उठता लाथ, बसता बुक्‍की! (ढिंग टांग!) | eSakal", "raw_content": "\nउठता लाथ, बसता बुक्‍की (ढिंग टांग\nबुधवार, 14 जून 2017\nचांगलं मैदानात जावं आणि तलवार गाजवावी पण तेवढं बरीक इकडच्यांना सांगून उपयोगाचं नाही पण तेवढं बरीक इकडच्यांना सांगून उपयोगाचं नाही माजघरातच तुमची मर्दुमकी\nस्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान.\nवेळ : भरत आलेली\nपात्रे : राजाधिराज उधोजी महाराज, सौभाग्यवती कमळाबाई आणि...सरनोबत संजयाजी.\nवातावरण गंभीर आहे. कमळाबाई काहीशा आजारी मंचकावर पडून आहेत. त्यांच्या उशाशी उधोजीराजे चिंतित होऊन उभे आहेत. अब आगे...\nउधोजीराजे : (घाबरत घाबरत) बरं वाटतंय का आता\nकमळाबाई : (संतापून अंथरुणातच) मला काय धाड भरलीये हातीपायी धड आहे की हातीपायी धड आहे की तुमच्या ह्या तलवारीच्या हातापायीनं हे होऊन बसलं तुमच्या ह्या तलवारीच्या हातापायीनं हे होऊन बसलं\nउधोजीराजे : (ओशाळून) आम्ही तलवारबाजीची नुसती प्रॅक्‍टिस करत होतो तुम्ही मध्येच कडमडाल, हे कोणाला ठाऊक होतं तुम्ही मध्येच कडमडाल, हे कोणाला ठाऊक होतं दैव बलवत्तर म्हणून घाव बसला नाही ह्या उधोजीचा दैव बलवत्तर म्हणून घाव बसला नाही ह्या उधोजीचा नाहीतर भलतंच काही होवोन बसलं असतं\nकमळाबाई : (वैतागानं) काही अडलं होतं, माजघरात तलवारबाजीची प्रॅक्‍टिस करायला चांगलं मैदानात जावं आणि तलवार गाजवावी चांगलं मैदानात जावं आणि तलवार गाजवावी पण तेवढं बरीक इकडच्यांना सांगून उपयोगाचं नाही पण तेवढं बरीक इकडच्यांना सांगून उपयोगाचं नाही माजघरातच तुमची मर्दुमकी अगं मेले गं...गेली माझी कंबर\nउधोजीराजे : (हताशपणे) आम्ही तलवारीचे दोन-चार हवेत हात करतो काय आणि तुम्ही सतरंजीवर धडपडून खाली पडता काय\nकमळाबाई : (फणकाऱ्यानं) काही अतर्क्‍य बितर्क्‍य नाही चांगले \"काटो, मारो गनिम को' असं ओरडलात चांगले \"काटो, मारो गनिम को' असं ओरडलात मी ऐकलंय स्वत:च्या कानांनी\nउधोजीराजे : (आणखी ओशाळून) अहो, त्याला अंगात वीरश्री संचारणं म्हणताऽऽत मर्द मावळ्याला अधूनमधून असं होतंऽऽ..\nकमळाबाई : (मंचकावर पडल्या पडल्या) जळलं तुमचं वीरश्रीचं लक्षण माझ्या कमरेत उसण भरलीये त्याचं काय माझ्या कमरेत उसण भरलीये त्याचं काय तेवढं लाटणं फिरवा म्हटलं, तर तेवढंही मेलं जमलं नाही तुम्हाला\nउधोजीराजे : (अन्यायग्रस्त चेहरा करत) ज्या हातांनी हयातभर तलवार फिरवली, त्यांनी लाटणी फिरवावीत, लाटणी\nकमळाबाई : (कसनुसा चेहरा करत) तेवढं टायगर बाम तरी लावून दिलं असतंत तर...तेही नाही\nउधोजीराजे : (डोळे विस्फारुन) टायगर बाम जाम झोंबतं माहिताय ना \"ठो ठो' ओरडाल मागल्या वेळेला तुमच्या कपाळाला मीच चोळलं होतं, आठवतंय ना\nकमळाबाई : (हात झटकत) मला मेलीला बिलकुल झाली नाही आग\nउधोजीराजे : (तावातावाने) पण मला झाली ना\nकमळाबाई : (घाईघाईने) पुढचं नका सांगू बाई आठवला तो प्रसंग तरी मी तेव्हा हात धुऊन घ्या, असं परोपरीनं सांगत होत्ये अगं बाई गं...मरत्ये आता\nउधोजीराजे : (घाबरुन) तुम्ही एवढ्या विव्हळू नका हो काळजाला घरं पडतात आमच्या काळजाला घरं पडतात आमच्या (गडबडीनं) कोण आहे रे तिकडे (गडबडीनं) कोण आहे रे तिकडे\nसंजयाजी : (मुजरा करत प्रवेश) आज्ञा महाराज\nउधोजीराजे : (आदेश देत) कमळाबाई राणीसाहेबांच्या कमरेत उसण भरली आहे उठता येईना की बसता येईना उठता येईना की बसता येईना राजवैद्यांना त्वरित पाचारण करोन बोलावून घेणे राजवैद्यांना त्वरित पाचारण करोन बोलावून घेणे उपचार करणे\nसंजयाजी : (पेशंटकडे पाहात) कंबर धरली म्हणता मग राजवैद्य कशाला हवा मग राजवैद्य कशाला हवा एक लाथ घातली की सरळ येतील राणीसाहेब\nउधोजीराजे : (किंचाळून) लाथ (तेवढ्यात संजयाजी आक्रमण करतात. \"हर हर हर हर महादेव अशी आरोळी ठोकत \"उपचार' करतात-धडाक (तेवढ्यात संजयाजी आक्रमण करतात. \"हर हर हर हर महादेव अशी आरोळी ठोकत \"उपचार' करतात-धडाक\nकमळाबाई : (गगनभेदी किंकाळी घुमते...) अगं आईग्गंऽऽ...\nसंजयाजी : (आत्मविश्‍वासानं) महाराजांचा शब्द म्हंजे देवावरचं फूल वाया कसं जाऊ देऊ वाया कसं जाऊ देऊ आपल्या आज्ञेप्रमाणे आम्ही लाथ घातली म्हणून तर बाईसाहेब सरळ आल्या आपल्या आज्ञेप्रमाणे आम्ही लाथ घातली म्हणून तर बाईसाहेब सरळ आल्या\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nऔरंगाबाद : 'एमआयएम'च्या नगरसेवकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा\nऔरंगाबाद : महापालिकेत एमआयएम नगरसेकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या पाच नगरसेवकांविरोधात शुक्रवारी (ता.17) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयएम नगरसेवक...\nघरकामगार, बांधकाम मजूर महिलांची उपेक्षाच\nजळगाव : दिवसरात्र काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, पण डोक्‍यावर हक्काचं छत नाही...सतत कष्ट करूनही पदरी काहीच न पडल्यामुळे अनेकदा उपवास...\nथ्री डी कोलाजमधून साकारले शिवचरित्र\nइचलकरंजी - जिद्द आणि चिकाटी ठेवत तब्बल ७ वर्षे परिश्रम घेत, येथील डॉ. ज्योती दशावतार बडे यांनी थ्री डी कोलाजमधून अवघे शिवचरित्र साकारले आहे. हा...\nपावसमध्येही होमिओपॅथिक हॉस्पिटल उभारू - राऊत\nरत्नागिरी - हार-तुऱ्यांसाठी आमची पदे नाहीत. जनसेवेची आमची भूमिका आहे. १०० टक्के समाजकार्य करून तुमचे आशीर्वाद मिळविण्यातच आम्हाला धन्यता मिळते....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathichatadka.blogspot.com/2016/02/blog-post.html", "date_download": "2018-08-18T08:48:40Z", "digest": "sha1:VMWDDJE33JTV642G6HHQYJWPBVEROHN3", "length": 4301, "nlines": 86, "source_domain": "marathichatadka.blogspot.com", "title": "मराठीचा तडका … : लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी", "raw_content": "\nलाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी\nलाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी\nजाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी\nधर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी\nएवढ्या जगात माय मानतो मराठी\nआमुच्या मनामनात दंगते मराठी\nआमुच्या रगारगात रंगते मराठी\nआमुच्या उराराउरात स्पंदते मराठी\nआमुच्या नसानसात नाचते मराठी\nआमुच्या पिलापिलात जन्मते मराठी\nआमुच्या लहानग्यात रांगते मराठी\nआमुच्या मुलामुलीत खेळते मराठी\nआमुच्या घराघरात वाढते मराठी\nआमुच्या कुलाकुलात नांदते मराठी\nयेथल्या फुलाफुलात हासते मराठी\nयेथल्या दिशादिशात दाटते मराठी\nयेथल्या नगानगात गर्जते मराठी\nयेथल्या दरीदरीत हिंडते मराठी\nयेथल्या वनावनात गुंजते मराठी\nयेथल्या तरुलतात साजते मराठी\nयेथल्या कळीकळीत लाजते मराठी\nयेथल्या नभामधून वर्षते मराठी\nयेथल्या पिकांमधून डोलते मराठी\nयेथल्या नद्यांमधून वाहते मराठी\nयेथल्या चराचरात राहते मराठी\nपाहुणे जरी असंख्य पोसते मराठी\nआपुल्या घरात हाल सोसते मराठी\nहे असे कितीक खेळ पाहते मराठी\nशेवटी मदांध तख्त फोडते मराठी\nLabels: कविता, गाणे, मराठी, सुरेश भट\nबॉलिवूडमध्ये झळकलेल्या मराठी मुली ... २\n९. मधू सप्रे १०. ममता कुलकर्णी ११. किमी काटकर १२. किशोरी शहाणे १३. माधुरी दिक्षित १४. ईशा कोप्पीकर ...\nबॉलिवूडमध्ये झळकलेल्या मराठी मुली ... १\n१. अर्चना जोगळेकर २. अश्विनी भावे ३. भाग्यश्री पटवर्धन ४. गायत्री जोशी ५. अदिती गोवित्रीकर ६. अमृत...\nलाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://punerispeaks.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9/", "date_download": "2018-08-18T08:40:03Z", "digest": "sha1:NAFBRFQA33YAZ7NASVXBSC4JMXAPBWYH", "length": 3014, "nlines": 59, "source_domain": "punerispeaks.com", "title": "मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान Archives - Puneri Speaks", "raw_content": "\nTag: मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान\nशेतकरी चोर आणि बेईमान आहेत, त्यांना चपलेने मारलं पाहिजे; भाजप नेते हकम सिंह अनजाना यांचे वादग्रस्त विधान\nभाजपचे नेते वादग्रस्त वक्तव्य यांचे नाते संपताना काही दिसत नाही. त्यातील काही नेते जनसामान्यांना चिडवण्याचे काम करत आहेत. शेतकऱ्याला जगाचा … Read More “शेतकरी चोर आणि बेईमान आहेत, त्यांना चपलेने मारलं पाहिजे; भाजप नेते हकम सिंह अनजाना यांचे वादग्रस्त विधान”\nAsian Games 2018: आशियाई क्रीडा स्पर्धा वेळापत्रक, प्रक्षेपण, कबड्डी संघ वेळापत्रक\nपिंपरीत प्रियकराने ‘Shivde, I Am Sorry’ चे ३०० फलक लावले, कोण आहे शिवडे\nअटल बिहारी वाजपेयी माहिती, अटल बिहारी वाजपेयी विशेष , अटल बिहारी वाजपेयी मराठी, अटल बिहारी वाजपेयी कविता\nपुणे तिथे काय उणे: देशात राहण्यासाठी पुणे शहर अव्वल स्थानी\nआरक्षण – एक शोधनिबंध | आरक्षण माहिती | आरक्षण म्हणजे काय\nRaj Thackeray VS Ajit Pawar: पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळ्यात एकमेकांवर टीका, वॉटरकप 2018 विजेते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://m4marathi.com/v2/safe-driving-tips-marathi/", "date_download": "2018-08-18T09:05:19Z", "digest": "sha1:U3AKB5CSUEEJJHVSX3XUAEIJCYA5S2EN", "length": 5928, "nlines": 64, "source_domain": "m4marathi.com", "title": "गाडी चालवीत असतांना 'सावधान'! | m4marathi", "raw_content": "\nगाडी चालवीत असतांना ‘सावधान’\nमित्रांसोबत गप्पा मारत बसलो होतो. सहज विषय निघाला, ‘अपघातांचा’ दचकले ना जो तो त्यांनी पाहिलेले अथवा ऐकलेले अपघात सांगत होता. एकाने नुकताच काही दिवसांपूर्वी झालेला अपघात सांगितला. कुठल्याशा मोबाईल कंपनीत नोकरीला असलेला एक युवक हाय-वे वर दुचाकी चालवितांना कानात हेडफोन लावून बोलत होता, त्यामुळे मागून येणाऱ्या डंपरच्या हॉर्नचा आवाज त्याला ऐकू आला नाही. तितक्यात त्याच्या कानातून हेडफोन निसटला तो एका हाताने पुन्हा लावण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि तो डंपरच्या मागील चाकाखाली आला. त्याच्या डोक्यावरून डंपरचे चाक गेल्याने तो जागीच गतप्राण झाला.\nमला प्रश्न पडतो की कितीही महत्वाचे काम असले तरीही गाडी चालवितांना मोबाईल वर बोलणे आवश्यक आहे का विशेषतः कार्पोरेट कंपनीत काम करणे कर्मचारी गाडी चालवितांना अथवा काहीही करतांना सारखे मोबाईलवर बोलत असतात. मात्र हीच गोष्ट जीवावर बेतणारी ठरू शकते. एकतर डोक्यावर हेल्मेटही नसते. हेल्मेट ओझे वाटत असले तरीही हाय-वे वर दुचाकी चालवीत असतांना हेल्मेटचा वापर करायलाच हवा. हेल्मेट नेहमी वापरले तर उत्तमच विशेषतः कार्पोरेट कंपनीत काम करणे कर्मचारी गाडी चालवितांना अथवा काहीही करतांना सारखे मोबाईलवर बोलत असतात. मात्र हीच गोष्ट जीवावर बेतणारी ठरू शकते. एकतर डोक्यावर हेल्मेटही नसते. हेल्मेट ओझे वाटत असले तरीही हाय-वे वर दुचाकी चालवीत असतांना हेल्मेटचा वापर करायलाच हवा. हेल्मेट नेहमी वापरले तर उत्तमच गाडी चालवितांना फोनवर बोलणे टाळावे. चित्रपटाची अथवा इतर जाहिरातींची पोस्टर्स रस्त्याच्या दुतर्फा असतात. रस्त्याने जातांना ही पोस्टर्स सहजच लक्ष वेधून घेतात. मात्र गाडी चालवितांना अशा पोस्टर्सकडे बघत गाडी चालविणेदेखील धोक्याचे ठरू शकते. वेग नेहमी मर्यादित ठेवावा. पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. ह्या दिवसांत बरेचदा गाडीचा ब्रेक लागत नाही, त्यामुळे ब्रेक तपासून घेणे आवश्यक आहे.\nघरी आपली काळजी करणारे आणि घेणारे इतरही लोक असतात, मात्र घराबाहेर असतांना आपण स्वतःच स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे आणि तेच आपल्याला वाचवू शकते.\nद्रष्टे समाजसुधारक ….राजर्षी शाहू महाराज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/youtube-playlist", "date_download": "2018-08-18T08:19:06Z", "digest": "sha1:X57YZAPJZMF3CBFDOHECTCG3M4S5SEA4", "length": 1925, "nlines": 51, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Marathi Dhamaal works cool when JavaScript is enabled!, Please enable Javascript.", "raw_content": "\nमदर्स डे च्या विशेष\nकॉफी आणि बरच काही\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation जावेद जाफरीचं ‘युथ’ साठी मराठमोळं रॅपसॉंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%AA/", "date_download": "2018-08-18T07:59:49Z", "digest": "sha1:BH3WIKZCGNH2IKX6XBPNTDHYB7MOTS2Z", "length": 8884, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सांगलीतील पराभवाचे आत्मपरीक्षण करणार – हर्षवर्धन पाटील | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसांगलीतील पराभवाचे आत्मपरीक्षण करणार – हर्षवर्धन पाटील\nकोल्हापूर – सांगली महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा झालेला पराभव आघाडीच्या नेत्यांना चांगलाच जिव्हारी लागला आहे. गेल्या तीस वर्षांत कधी न झालेला सांगली महापालिकेतील सत्ता बदलाबाबत कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आता आत्मपरीक्षण करणार असल्याची माहिती माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.\nमराठा आरक्षणाबाबत राज्यभर सुरू असणाऱ्या आंदोलनाला कॉंग्रेसचा पाठिंबा आहे. आघाडी सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाची आताच्या सरकारने अंमलबजावणी करावी म्हणजे मराठा समाजाला तात्काळ आरक्षण मिळू शकेल, असे त्यांनी म्हटले आहे.\nराज्यातील साखर कारखानदारीही सध्या अनेक अडचणींना सामोर जात आहे. साखर कारखानदारीचे भविष्य पाहता केंद्र आणि राज्य सरकारने विविध योजना राबवण्याची गरज असल्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे. तसेच राज्यातील साखर कारखाने हे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.\nभाजपाला किंमत मोजावी लागेल\nहर्षवर्धन पाटील यांनी कोल्हापुरात दसरा चौकात सुरू असणाऱ्या मराठा क्रांती ठोक आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच नऊ तारखेला होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनात आपण मोठ्या संख्येने कार्यकर्ते घेऊन त्याठिकाणी सहभाग नोंदवणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nयावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, भाजप सरकारमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी इच्छाशक्ती नाही. भाजप सरकारमधील मंत्री मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कोणतेही शासकीय सोपस्कर पूर्ण करताना दिसत नाहीत. केवळ वेळकाढूपणा करतात. परंतु सरकारला याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदक्षिण आफ्रिका अ संघाच्या 8 बाद 246 धावा\nNext articleसुरक्षा सामान्य माणसांची (भाग-२)\nकोल्हापुरात चार बंदुका, दारूगोळा जप्त ; चौघाजणांच्या शिकारी टोळीला अटक\nमराठा नेत्यांनीच मराठा आंदोलनाला केले बदनाम\nकोल्हापूरात शेतमजुराला बुडताना वाचविले\nमराठा आणि बहुजनांत फूट पाडण्याचा डाव\nऔरंगाबाद तोडफोड प्रकरणी 41 जण अटकेत\nमराठा आंदोलनाविरोधात जनहित याचिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/steel-cement-rate-increase-43456", "date_download": "2018-08-18T08:27:35Z", "digest": "sha1:LORHNW7SNL2REGHKJ7TJ3IANLWAIAQMA", "length": 13716, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "steel cement rate increase स्टील, सिमेंटचे भाव भिडले गगनाला | eSakal", "raw_content": "\nस्टील, सिमेंटचे भाव भिडले गगनाला\nशुक्रवार, 5 मे 2017\nसर्वसामान्यांचे घराचे स्वप्न दिवसेंदिवस धूसर\nउस्मानाबाद - एका बाजूला जागांचे भाव गगनाला भिडत असताना दुसऱ्या बाजूला बांधकाम साहित्याचे दरही दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न अधिक धूसर होत चालले आहे.\nसर्वसामान्यांचे घराचे स्वप्न दिवसेंदिवस धूसर\nउस्मानाबाद - एका बाजूला जागांचे भाव गगनाला भिडत असताना दुसऱ्या बाजूला बांधकाम साहित्याचे दरही दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न अधिक धूसर होत चालले आहे.\nसध्या बांधकाम साहित्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपासून वाळू, स्टीलच्या दरात भरमसाट वाढ होत असून, सिमेंटच्या दरात अचानकपणे पन्नास रुपयांची वाढ केल्याने बांधकाम व्यावसायिकांना फटका बसला आहे. तरीही त्यांच्या चढ्या दराचा अप्रत्यक्ष तोटा ग्राहकांना बसणार आहे. सध्या या क्षेत्रात मंदी आल्याचे बोलले जात असले तरी त्यातील भाव वाढत असल्याने मोठी अडचण होणार असे दिसत आहे.\nबांधकाम क्षेत्रामध्ये मंदीचे सावट वाढलेले आहे. नवीन करप्रणाली जी.एस.टी. लागू होणार असल्याने त्याचाही किंमतीवर चांगलाच परिणाम भविष्यात दिसण्याची शक्‍यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. बांधकामासाठी आवश्‍यक साहित्याच्या किंमतीत कायमच वाढ होत असल्याने त्याचा या क्षेत्रावर दूरगामी परिणाम होणार असे बोलले जात आहे. गेल्या पाच- सहा वर्षांत बांधकाम क्षेत्रात म्हणावी तशी उलाढाल झालेली नाही. त्याची विविध कारणे आहेत. त्यात अशा दरवाढीचा फटका या क्षेत्राला बसला आहे.\nबांधकाम साहित्याचे दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न झाला असला तरी या व्यवसायाला चांगले दिवस आले असते; मात्र आता बांधकाम साहित्यच दिवसेंदिवस महाग होत चालले आहे. तीन महिन्यांपासून स्टीलच्या दरात वाढ होत आहे. आठ दिवसांपूर्वी असलेला स्टीलचा तीन ते तीन हजार आठशेपर्यंतचा दर आता चार ते साडेचार हजार इतका झाला आहे. टनामागे दोन ते अडीच हजार रुपयांची वाढ झाली आहे. वाळूच्या दरातही मोठ्या प्रमाणात तेजी आली आहे. पूर्वी चार ब्रास वाळूची किंमत १९ हजारांवर होती, आता ती २५ हजारांच्या घरात गेली आहे. पावसाळ्यात वाळूच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. सिमेंटच्या दरात अचानक एक महिन्यात मोठी वाढ झाली असून, एका पोत्याचा दर २९० रुपयांवरून ३४० ते ३६० रुपयांवर गेला आहे.\nबांधकामासाठी लागणाऱ्या गवंडी व त्यांच्या हाताखाली काम करणारे कामगार, सेंट्रिंगवाले यांच्या मजुरीमध्येही वाढ झाली आहे. या सर्व बाबींचा फटका बांधकाम करणाऱ्यांना बसला आहे.\nपिंपळवंडीला मानव-बिबट सहजीवन जनजागृती\nजुन्नर - पिंपळवंडी ता.जुन्नर येथे मानव व बिबट संघर्ष व सहजीवन याविषयी मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती करण्यात आली. जुन्नर वन विभाग तसेच...\nरावेतला स्वतंत्र पोलिस चौकीची मागणी\nवाल्हेकरवाडी - रावेत परिसराचा विकास झपाट्याने वाढत आहे, त्याचप्रमाणे गुन्हेगारीही वाढत आहे. रावेत परिसरात गुन्हा घडला अथवा काही कारणास्तव पोलिस...\nचिंचवडमध्ये रविवारी रंगणार महिला प्रेरणा संमेलन\nवाल्हेकरवाडी - स्वयंसिद्धा प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड शहर) आणि प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि. 19 ऑगस्ट) चिंचवड...\nडिजिटायझेशन'ने दुर्मिळ ग्रंथही चिरकाल \nजळगाव ः पुस्तकांचा खजिना सांभाळणाऱ्या अनेक वाचनालयांना शतकोत्तरी परंपरा लाभलेली आहे. परंतु काळानुरूप ग्रंथालयांनी तंत्रज्ञानाशी जुळवून, त्या दिशेने...\nनोटा बदलवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश\nरावेर : जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा बदलून देणाऱ्या गुजरातमधील टोळीस इंदूरमध्ये मध्य प्रदेश पोलिसांनी आज पकडले. या टोळीत रावेर, भुसावळच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/aachaman/", "date_download": "2018-08-18T08:45:32Z", "digest": "sha1:JNMFL7WGEWA26PCZ72IYF3TTAKIC2VTT", "length": 9211, "nlines": 91, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "आचमन (Aachaman) - Aniruddha Bapu Pitruvachanam", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nपरमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० फेब्रुवारी २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘ आचमन म्हणजे त्रिविक्रमाचं स्मरण आणि सन्मान आहे ‘ याबाबत सांगितले.\nतुम्ही एक प्रयोग सगळ्यांनी करुन बघा. व्यवस्थित शास्त्रशुद्धपणे पंचधातूच्या एका तांब्याच्या पळीतून तुम्ही तेवढच पाणी घ्यायचं, हातावर नीट घ्यायचं आणि प्यायचं. तुम्हाला जाणवेल ते पाणी पिण्याची क्रिया अशी घडते, आपल्या मसल्सच्या, ह्या pharyngeal musclesच्या contraction reactions मुळे संपूर्ण घसा आणि तोंड व्यवस्थित ओलं होतं.\nजे काम एक ग्लास पाण्याने होणार नाही, ते काम ह्या एका आचमनाने होतं. आचमनं आम्ही किती घेतो नेहमी तीन घेतो. ते तीन आचमन म्हणजे काय तीन घेतो. ते तीन आचमन म्हणजे काय तीन आचमनं मिळून एक आचमन होतं, तीन वेळा पाणी पिणं म्हणजे ह्या त्रिविक्रमाचं सन्मान आहे, त्याचं स्मरण आहे. म्हणून प्रत्येक धर्मकार्यामध्ये आचमन घ्यावंच लागतं. धर्मकार्यामध्ये, मग ते शुभ असो कि आपण ज्याला म्हणतो, दुःखाचं आहे, तिकडेसुद्धा आचमन घ्यावंच लागतं, पद्धत तीच आहे, नावं पण तीच आहेत. किती पटलं तीन आचमनं मिळून एक आचमन होतं, तीन वेळा पाणी पिणं म्हणजे ह्या त्रिविक्रमाचं सन्मान आहे, त्याचं स्मरण आहे. म्हणून प्रत्येक धर्मकार्यामध्ये आचमन घ्यावंच लागतं. धर्मकार्यामध्ये, मग ते शुभ असो कि आपण ज्याला म्हणतो, दुःखाचं आहे, तिकडेसुद्धा आचमन घ्यावंच लागतं, पद्धत तीच आहे, नावं पण तीच आहेत. किती पटलं कुठल्याही देवाचं पूजन असो, आचमनाची नावं तीच आहेत. पण आम्ही कधी करुन बघितलं आहे का कुठल्याही देवाचं पूजन असो, आचमनाची नावं तीच आहेत. पण आम्ही कधी करुन बघितलं आहे का आम्ही आपलं पाणी पितो, पितो कसबसं हात इथे पुसायचा घाईत.\nनाही, आचमन ही आपल्या हिंदू संस्कृती मधली, वैदिक संस्कृतीमधली, ह्या भारतीय संस्कृतीमधली अतिशय महत्वाची गोष्ट आहे. पाणी पितांना आचमनासारखंच प्यावं. काहीतरी वेडेपणा करू नका, एक ग्लास घेतला आहे, आणि चमच्या चमच्याने पिता आहात. असं करायचं नाही. हळूहळू प्यायचं. मागे सांगितलेलं आठवतं ना की प्यावं कसं पाणी की जेवतोय असं. आणि जेवावं कसं पाणी प्यायल्यासारखं. म्हणजे काय तर जेवतांना एवढं चावून चावून खावं की तो तोंडात घातलेला पदार्थ पाण्यासारखा सहजतेने गिळता आला पाहिजे, तर पाणी कसं गिळावं पाणी प्यायल्यासारखं. म्हणजे काय तर जेवतांना एवढं चावून चावून खावं की तो तोंडात घातलेला पदार्थ पाण्यासारखा सहजतेने गिळता आला पाहिजे, तर पाणी कसं गिळावं एक एक घास. ह्याच्यामध्ये खूप मोठी ताकद आहे. आणि ह्या पाण्यामध्ये ह्या त्रिविक्रमाची स्पंदनं असतात.\nत्रिविक्रमाची स्पंदनं तुम्ही पिण्याच्या प्रत्येक पाण्यामध्ये असतातच लक्षात ठेवा की पाणी जे आम्ही पितो, त्या पाण्यामधलं आचमन हे जर आम्ही दररोज, म्हणजे पाणी पिण्याची क्रिया जर आम्ही त्या पद्धतीने केली, तर आमच्या शरिरामध्ये कोणाची vibrations खेळणार आहेत त्रिविक्रमाच्या ह्या अल्गोरिदमची. आणि ह्यामुळे खरोखरच कमालीचे फरक पडतात लक्षात ठेवा, असे सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात सांगितले ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.\n॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\nभगवान को एक प्यारी सी स्माईल दो (Give The Lord you...\nप्रत्येक जण स्वत:ची लढाई लढत असतो (Everyone is fi...\nईरान मसले पर तनाव बढा\nत्रिविक्रमाची १८ वचने (मराठी)\nत्रिविक्रम के १८ वचन (हिन्दी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-nine-lakh-rupees-wine-seized-51164", "date_download": "2018-08-18T08:29:18Z", "digest": "sha1:FIRANWNJ364U2KGZXEUGLFSNP2TCFV6E", "length": 11479, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news nine lakh rupees wine seized कऱ्हाड परिसरात नऊ लाखांचा मद्यसाठा जप्त | eSakal", "raw_content": "\nकऱ्हाड परिसरात नऊ लाखांचा मद्यसाठा जप्त\nगुरुवार, 8 जून 2017\nकोल्हापूर - मौजे शिवडे (ता. कऱ्हाड) गावातील एका खोलीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून नऊ लाख रुपये किमतीचा देशी-विदेशी मद्याचा साठा जप्त केला. त्याचबरोबर शेणोली येथे अवैध ताडीविक्री केंद्रावर छापा टाकून 135 लिटर ताडी जप्त केली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.\nकोल्हापूर - मौजे शिवडे (ता. कऱ्हाड) गावातील एका खोलीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून नऊ लाख रुपये किमतीचा देशी-विदेशी मद्याचा साठा जप्त केला. त्याचबरोबर शेणोली येथे अवैध ताडीविक्री केंद्रावर छापा टाकून 135 लिटर ताडी जप्त केली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.\nअटक केलेल्या संशयितांची नावे गौरव कैलास अर्जुगडे (वय 25, रा. हनुमानवाडी, ता. कऱ्हाड), नंदकुमार प्रकाश कडव (वय 32, रा. आगाशिवनगर मलकापूर, कऱ्हाड) आणि बानू कृष्णा बड्यावार (वय 22, मूळ रा. हैदराबाद, सध्या रा. शेणोली, ता. कऱ्हाड) अशी आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील महामार्गांलगतच्या 50 मीटर अंतरावरील मद्यविक्रीची दुकाने बंद झाली आहेत. सुमारे 75 टक्के दुकाने बंद झाल्यामुळे मद्याला मोठी मागणी सुरू झाली. याचाच फायदा उठवून शिवडे (ता. कऱ्हाड) गावात देशी मद्याची विक्री करण्यासाठी साठा केला जात असल्याची माहिती निरीक्षक युवराज शिंदे यांना मिळाली. काल सायंकाळी या गावातील जी. एस. नर्सरीजवळील एका बंदिस्त खोलीवर पथकाने छापा टाकला.\nबारामती - विद्या प्रतिष्ठानच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पुरस्कार\nबारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून सहाजण जखमी\nबेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने बंगळूरकडे जाणारी व्हीआरएलची आराम बस उलटून चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय...\nउंड्री - पाचव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजूर ठार\nउंड्री - गुलाम अली नगर गल्ली नं 6 दि.13 ऑगस्ट दु.12.30 वाजता एका निर्माणाधीन इमारतीचे काम सुरू असताना पाचव्या मजल्यावर पडून राजशेखर माशाले (वय 33...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%8A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-18T08:00:16Z", "digest": "sha1:D33YDV67FTI6YNDIZ75ZEDRK6L7TCOCY", "length": 9832, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बॅंका, ऊर्जा आणि दूरसंचार कंपन्या तेजीत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबॅंका, ऊर्जा आणि दूरसंचार कंपन्या तेजीत\nएचडीएफसी एएमसीचा शेअर उसळला\nएचडीएफसी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (एचडीएफसी एएमसी) कंपनीच्या प्राथमिक समभाग विक्रीला गेल्या आठवड्यात 83 पटीनी अधिक प्रतिसाद मिळाला. आज या कंपनीचा शेअरबाजारात नोंदला गेल्यानंतर कंपनीच्या शेअरच्या भावात तब्बल 65 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. आयपीओसाठी शेअरचे मूल्य केवळ 1095 ते 1100 रुपये इतके होते. आज या शेअरचे मुल्य एक वेळ 1842 रूपयापर्यंत वाढले होते. नंतर ते 1815 रुपयांवर स्थिरावले. एचडीएफसी एएमसी ही एचडीएफसी आणि स्टॅडर्ड लाईफची संयुक्त कंपनी आहे. या कंपनीने 2800 कोटीच्या उभारणीसाठी आयपीओ बाजारात आणला होता. ही कंपनी 3 लाख कोटी रुपयाच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करते.\nमुंबई: निर्देशांक उच्च पातळीवर असूनही संस्थागत गुंतवणूकदारांकडून खरेदी चालू असल्यामुळे रोज शेअरबाजार निर्देशांक नव्या उच्चांकी पाळीवर जात आहेत. सोमवारीही शेअरबाजाराचे निर्देशांक नव्या विक्रमी पातळीवर गेले. बॅंका, ऊर्जा आणि दूरसंचार कंपन्यांच्या शेअरची सोमवारी जास्त खरेदी झाल्याचे दिसून आले. सोमवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजारचा निर्देशांक सेन्सेक्‍स 0.36 टक्‍क्‍यांनी म्हणजे 135 अंकांनी वाढून 37691 अंकावर बंद झाला. मात्र, आज सर्वच कंपन्यांचे शेअर वाढले नाहीत. तर सेन्सेक्‍ससबंधित 30 कंपन्यापैकी केवळ 13 कंपन्याचे शेअर वाढले. हि विषम वाढ आणि निर्देशांकांचे वाढणे हा विश्‍लेषकांच्या दृष्टिकोणातून चिंतेचा विषय झाला आहे. सोमवारी राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 26 अंकांनी वाढून 11387 या नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला.\nजागतिक बाजारातून आज नकारत्मक संदेश आले. त्याचबरोबर रुपयाचे मूल्यही स्थिर नव्हते. त्यामुळे शेअरबाजारात दिवसभर खरेदी आणि विक्रीच्या लाटा आल्या. तरीही भारतीय शेअरबाजाराचे निर्देशांक शुक्रवारच्या तुलनेत आज वाढले. काही मोठ्या कंपन्यांनी सादर केलेले नफादायक ताळेबंद त्याचबरोबर बऱ्याच आयपीओंना गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे भारतीय शेअरबाजारातील वातावरण सकारात्मक असल्याचे जीओजी वित्तीय सेवाचे मुख्य विश्‍लेषक विनोद नायर यांनी यावेळी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआज का शेयर बाजार\nPrevious articleभारतीय पर्यटकांना श्रीलंकेत लवकरच व्हिसा मुक्त प्रवेश\nNext articleपीएमपीची कामचुकार वाहकावर नजर\nअलाहाबाद, आयडीबीआय बॅंकेच्या तोट्यात झाली वाढ\n60 हजार महिला डिजिटल साक्षर\nतुर्कस्तानातील पेचामुळे रुपया ऐतिहासिक नीचांकावर\nमहागाई घसरल्याने शेअर निर्देशांकांत भरीव वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/january-21/", "date_download": "2018-08-18T09:11:01Z", "digest": "sha1:YYDVM2CPSUBZ3ADSKR7X7SC4ASGT7S67", "length": 7717, "nlines": 157, "source_domain": "www.marathimati.net", "title": "२१ जानेवारी दिनविशेष | January 21", "raw_content": "\n१६६२ : शिवरायांनी तळकोकण काबीज केले.\nदुसर्‍या महायुध्दात ‘फिल्ड मार्शल लिबियन’ या मोहिमेस प्रारंभ.\n१९७२ : मणिपूर व मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.\n१९९९ : जर्मन सरकारच्या ‘फोरम ऑफ आर्ट ऍंड एक्झिबिशन’ ने १९९९ च्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी विख्यात सतारवादक पं. रवी शंकर यांची निवड केली.\n२००० : ‘फायर ऍंड फरगेट’ या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताकडून यशस्वी चाचणी.\n२००३ : राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्यांना अधिक कठोर शिक्षा करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय.\n१८९४ : कवी माधव जूलियन (माधव त्रिंबक पटवर्धन).\n१८८२ : वा. म. जोशी.\n१८९८ : मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, अभिनेते, संगीतकार.\n१९२४ : प्रा.मधू दंडवते, माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ समाजवादी नेते.\n१९२४ : रशियन राज्यक्रांतीचा जनक लेनिन.\n१९४५ : रासबिहारी बोस.\n१९९८ : एस.एन.कोहली, माजी नौदलप्रमुख अॅडमिरल.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in दिनविशेष and tagged कृष्णराव फुलंब्रीकर, जन्म, जागतिक दिवस, ठळक घटना, दिनविशेष, पंडित रविशंकर, मणिपूर, माधव जूलियन, माधव त्रिंबक पटवर्धन, मास्टर कृष्णराव, मृत्यू, मेघालय, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, रासबिहारी बोस, २१ जानेवारी on जानेवारी 21, 2013 by संपादक.\n← २० जानेवारी दिनविशेष २२ जानेवारी दिनविशेष →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/increase-percentage-girls-iit-says-president-132273", "date_download": "2018-08-18T08:53:28Z", "digest": "sha1:6A545K7R6EQOM77JC7ACOSM6U4UAHM4Z", "length": 12184, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Increase in percentage of girls in IIT says President 'आयआयटी' मुलींचा टक्का वाढावा : राष्ट्रपती | eSakal", "raw_content": "\n'आयआयटी' मुलींचा टक्का वाढावा : राष्ट्रपती\nशनिवार, 21 जुलै 2018\nआयआयटीतील मुलींचे प्रमाण वाढविण्याचे आव्हान तसेच मुली व तरुण महिलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध न केल्यास समाजाचा विकास कधीही पूर्ण होऊ शकणार नाही. ही बाब सामाजिक समानता व आर्थिक विकासासाठी मारक आहे. उच्च शिक्षण तसेच विज्ञान व तंत्र शिक्षणात महिलांचा सहभाग वाढविणे हे राष्ट्रीय प्राधान्य असायला हवे. यासाठी आयआयटी समितीने पुढाकार घ्यावा.\n- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती\nखडगपूर (पश्‍चिम बंगाल) : दहावी-बारावी, महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावरील परीक्षांमध्ये मुलांपेक्षा मुली चमकतात. मात्र \"इंडियन इन्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी'च्या (आयआयटी) पातळीवर मुलींचे प्रमाण कमी असणे ही दुःखद बाब असून, मुलींचा टक्का \"आयआयटी'त वाढायला हवा, अशी आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी केले.\nआयआयटी खडगपूरच्या 64 व्या पदवीदान समारंभात कोविंद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, \"\"2017मध्ये एक लाख 60 हजार उमेदवार आयआयटीच्या सामाईक प्रवेश परीक्षेला बसले होते. त्यात मुलींची संख्या फक्त 30 हजार होती. निवड झालेल्या 10 हजार 878 विद्यार्थ्यांमध्ये 995 मुली होत्या. आयआयटीत मुलींची संख्या कमी का असते हे माझ्यासाठी कोडे आहे; असे होता कामा नये. यासाठी आपल्याला काही तरी करायला हवे.'' दहावी-बारावीच्या परीक्षेचा विचार करता तेथे मुलींची कामगिरी चमकदार असते. त्या कायमच मुलांपेक्षा सरस ठरतात. महाविद्यालये किंवा विद्यापीठांत मी जातो, तेव्हाही पदकविजेत्यांमध्ये मुलींची संख्या जास्त असल्याचे दिसते; पण \"आयआयटी'त प्रवेश घेणाऱ्या मुली कमी आढळतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nपिंपळवंडीला मानव-बिबट सहजीवन जनजागृती\nजुन्नर - पिंपळवंडी ता.जुन्नर येथे मानव व बिबट संघर्ष व सहजीवन याविषयी मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती करण्यात आली. जुन्नर वन विभाग तसेच...\nरावेतला स्वतंत्र पोलिस चौकीची मागणी\nवाल्हेकरवाडी - रावेत परिसराचा विकास झपाट्याने वाढत आहे, त्याचप्रमाणे गुन्हेगारीही वाढत आहे. रावेत परिसरात गुन्हा घडला अथवा काही कारणास्तव पोलिस...\nचिंचवडमध्ये रविवारी रंगणार महिला प्रेरणा संमेलन\nवाल्हेकरवाडी - स्वयंसिद्धा प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड शहर) आणि प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि. 19 ऑगस्ट) चिंचवड...\nघरकामगार, बांधकाम मजूर महिलांची उपेक्षाच\nजळगाव : दिवसरात्र काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, पण डोक्‍यावर हक्काचं छत नाही...सतत कष्ट करूनही पदरी काहीच न पडल्यामुळे अनेकदा उपवास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/bitcoin-special-issue-aniruddha-bapu-pratyaksha-marathi/", "date_download": "2018-08-18T08:45:19Z", "digest": "sha1:MWKBZWUNLQKSSMG2DGQRPV7X3HIYPFXI", "length": 7071, "nlines": 87, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "दैनिक ‘प्रत्यक्ष’चा ’बिटकॉईन स्पेशल’ अंक", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nदैनिक ‘प्रत्यक्ष’चा ’बिटकॉईन स्पेशल’ अंक\nदैनिक ‘प्रत्यक्ष’चा ’बिटकॉईन स्पेशल’ अंक\n२०१२ साली ’बिटकॉईन्स्‌’ (Bitcoins) हा शब्द मी पहिल्यांदा ऎकला, तो बापूंच्या तोंडून. बापूंनी जुलै २०१२ मध्ये स्वत: २ दिवसांचा, तब्बल ३० तासांचा एक सेमिनार घेतला, ज्यात त्यांनी साधारण २५ हून अधिक विषयांचे, १७ विविध क्षेत्रांतील उपस्थितांसमोर सखोल विवरण केले. अटेंशन इकॉनॉमी (Attention Economy), जुगाड (Jugaad), क्लाऊड कॉम्प्युटिंग (Cloud Computing) सारख्या विषयांबरोबरच ’बिटकॉईन्स्‌’ हा विषय बापूंनी तेव्हा मांडला होता.\nत्यावेळेस अधिकांश सामान्यजनांना माहिती नसलेल्या किंवा जुजबी ऎकीव माहितीच असलेल्या ह्या विषयांच्या सेमिनारला बापूंनी ’नवीन सहस्‍त्रकाच्या योजना व धोरणे’ (Strategies of the New Millennium) हे नामाभिधान दिले. हे नावच या विषयांचे महत्त्व अधोरेखित करते.\nदैनिक ’प्रत्यक्ष’मध्ये आज म्हटल्याप्रमाणे “जगाचा प्रवास ’करन्सी’कडून क्रिप्टोकरन्सीच्या दिशेने सुरू झाला आहे”. ह्या प्रवासात, बापूंनी सेमिनार घेतलेल्या सालात म्हणजे २०१२मध्ये जर आपण डोकावले तर त्यावेळेस ‘एका बिटकॉईनला १३ अमेरिकी डॉलर’ हा भाव होता, जो आज ‘एका बिटकॉईनला तब्बल ६१८० अमेरिकी डॉलर’वर जाऊन धडकला आहे. ह्या एका आकडेवारीतून बापूंच्या दूरदृष्टीची आपल्याला ओळख होते.\nबापूंनी दिलेल्या ह्या मार्गदर्शनातून दैनिक ’प्रत्यक्ष’ वेळोवेळी अशा महत्त्वाच्या जागतिक घडामोडींसंबंधीच्या बातम्या देत आला आहे व आज ह्याच बिटकॉईन्स्‌चा खास वेध आपल्याला दैनिक ‘प्रत्यक्ष’च्या माध्यमातूनच घ्यायचा आहे; कारण आपण जरी आपल्या आसपासच्या परिस्थितीबद्दल सजग नसलो, तरी बापू त्यांच्या श्रद्धावान मित्रांना कायमच वास्तवाचे भान राखून सजग करत असतात.\nईरान मसले पर तनाव बढा...\nत्रिविक्रमाची १८ वचने (मराठी)...\nदैनिक ‘प्रत्यक्ष’ का ’बिटकॉईन स्पेशल’ अंक\nईरान मसले पर तनाव बढा\nत्रिविक्रमाची १८ वचने (मराठी)\nत्रिविक्रम के १८ वचन (हिन्दी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/december-13/", "date_download": "2018-08-18T09:10:28Z", "digest": "sha1:VFBBEZGAG4TXXRKY2PU7CVLNA3R3UQVL", "length": 8369, "nlines": 159, "source_domain": "www.marathimati.net", "title": "१३ डिसेंबर दिनविशेष | December 13", "raw_content": "\nमाल्टा : प्रजासत्ताक दिन\n१९४० : डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश’ हा ग्रंथ पूर्ण केला.\n१६४२ : सागरसंशोधन करणारे ब्रिटिश संशोधक एबेल जान्स्झून तास्मान यांनी न्यू झीलँड बेटे शोधून काढली.\n२००२ : ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.\n२००३ : प्रसिद्ध बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांना ऑफिसर ऑफ आर्टस ऍन्ड लिटरेचर हा फ्रान्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी किताब जाहीर.\n२००३ : इराकी अध्यक्ष सद्दाम हुसेनला तिक्रीतजवळ पकडले.\n१५०६ : गणित तज्ञ निकालो टार्टाग्लिया यांचा जन्म झाला.\n१५०३ : प्रख्यात ज्योतिषी मायकेल डी. नॉस्ट्रडेमस यांचा जन्म झाला.\n१९१३ : आर्ची मूर, मुष्टियोद्धा\n१९२४ : विद्याधर पुंडलिक, साहित्यिक\n१९२८ : सरिता पदकी, बालवाङ्मय लेखिका\n१९३० : रसायनशास्त्रज्ञ प्रेगल फ्रिटस यांचे निधन झाले.\n१९८६ : स्मिता पाटील, चित्रपट अभिनेत्री\n१९९४ : विश्‍वनाथ अण्णा ऊर्फ तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक.\n१९९६ : श्रीधर पुरुषोत्तम लिमये ऊर्फ शिरुभाऊ, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक.\n२००५ : रामानंद सागर, हिंदी चित्रपट निर्माता, निर्देशक.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in दिनविशेष and tagged जन्म, जागतिक दिवस, ठळक घटना, तात्यासाहेब कोरे, दादासाहेब फाळके पुरस्कार, दिनविशेष, न्यू झीलँड, महाराष्ट्रीय ज्ञानकोश, महाश्वेता देवी, मृत्यू, यश चोप्रा, रामानंद सागर, श्रीधर व्यंकटेश केतकर, सद्दाम हुसेन, स्मिता पाटील, १३ डिसेंबर on डिसेंबर 13, 2012 by संपादक.\n← हुतात्मा बाबू गेनू सैद व्हेज सीग कबाब →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/movies/loose-control", "date_download": "2018-08-18T08:15:49Z", "digest": "sha1:EPF7A2JLQBIQTMUISESQX3LYZZUHT3YD", "length": 3332, "nlines": 53, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Loose Control | Marathi Dhamaal", "raw_content": "\nदिग्दर्शक : अजय सिंग\nनिर्माता : अजित साटम, जिग्नेश पटेल, मिहीर भट, इनामदार रियाझ, साकीब शेख\nकलाकार : मधुरा नाईक, अक्षय म्हात्रे, मनमीत पेम, शशिकांतकेरकर, कुशल बद्रिके, शशांक शेंडे, भालचंद्र कदम, आरती सोळंकी, टिया अथर्व, बिनोद राय बनतावा, बंटी चोप्रा, नम्रता आवटे, प्राजक्ता हनमगर, नम्रता कदम, अजय पुरकर, रामा नादगौडा, दीपिका सोनवणे, अंजली अत्रे, पूजा केसकर, अंजली धारू, विकास वाघमारे, उमेश जगताप, प्रवीण खांडवे\nकथा : अजय सिंग\nपटकथा : अजय सिंग\nसंवांद : प्रियदर्शन जाधव\nसंगीत दिग्दर्शक : रोहित नागभीडे आणि मिहीर भट\nछायाचित्रण : मर्जी पगडीवाला\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation मुक्ताचा ‘कोड मंत्र’ लवकरच रंगभूमीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://marathisumane.blogspot.com/2011/12/sometimes-nothing-is-everything.html", "date_download": "2018-08-18T08:17:43Z", "digest": "sha1:X22CMW55KSG6DXG5ZZAMWRYLDTCTTUNV", "length": 12123, "nlines": 111, "source_domain": "marathisumane.blogspot.com", "title": "मराठी सुमने..: Sometimes NOTHING is EVERYTHING...", "raw_content": "\nकाही दिवसांपूर्वी Julia Roberts चा Eat, Pray, Love हा चित्रपट टीव्हीवर पाहत होते. Julia च्या इतर अनेक चित्रपटांच्या मानाने हा तसा संथ गतीचा आणि वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. कदाचित म्हणूनच की काय, तो हळूहळू आतमध्ये मुरत जातो आणि मग आपण चित्रपटातील philosophy वर कधी विचार करायला लागतो हे आपले आपल्यालाही कळत नाही...\nतर आयुष्याचा अर्थ शोधायला निघालेली एक मनातून अस्वस्थ अशी स्त्री.. तिला जगभर फिरताना काय काय अनुभव येतात आणि मग त्या अनुभवांचा एक घटक होताना ती आतून कशी शांत, समाधानी होत जाते याची ही कथा आहे. या प्रवासात एका टप्प्यावर ती इटलीला येऊन पोचते. तिथे काही दिवस व्यतीत करताना तिला त्या लोकांच्या कायम तोंडावर असलेले एक वाक्य खूप भावते - \"ll dolce far niente\" अर्थात \"the sweetness of doing nothing\" ....\nचित्रपट चालू असताना हे वाक्य आले आणि त्याने मनाचा कब्जा घेतला. एका दृष्टीने हा तसा नवीन विचार होता. - \"the SWEETNESS of doing NOTHING \" काही न करण्यातील गोडवा, आनंद \" काही न करण्यातील गोडवा, आनंद - अरे, इतके दिवस तर आपण कृतीशील असण्याबाद्दलचे कितीतरी विचार ऐकले. 'आराम हराम आहे' हेच आपल्यावर सतत बिंबवले गेले आहे. मग हे काय वेगळेच बरे - अरे, इतके दिवस तर आपण कृतीशील असण्याबाद्दलचे कितीतरी विचार ऐकले. 'आराम हराम आहे' हेच आपल्यावर सतत बिंबवले गेले आहे. मग हे काय वेगळेच बरे मी हळूहळू अंतर्मुख होत होते ... आणि एका क्षणी मला जाणवले की आपण आतून शांत शांत झालो आहोत... एका कुहरात हरवलो आहोत, ज्याच्या पलीकडे प्रकाश आहे की नाही याचीही आपल्याला फिकीर नाही... आणि मग अचानक वरील वाक्याचा अर्थ गवसला.... समाधी, समाधी म्हणतात ती याहून वेगळी असेल का\nखरच, एरव्ही आपण अगदी एकटे असतानाही किती गजबजाटात हरवलेलो असतो ना कामवालीच्या दांड्या, मुलांची शाळेची घाई, बॉसच्या deadline ची आठवण करून देणाऱ्या मेल्स, traffic चा त्रास, सहकाऱ्यांच्या कटकटी, संप, बंद, रोजचा पेपर वाचूच नये असे फिलिंग देणाऱ्या आतील बातम्या, पेट्रोल चे अखंड वाढते दर... एक ना दोन, हजार कटकटी.. काही आपल्या आवाक्यातील, तर बरयाचश्या आपल्या कुवतीबाहेरच्या...तरीपण आपण त्यांच्यावर विचार करणे, वैतागणे थांबवत नाही.. आणि हा सगळा भार पडतो आपल्या मनावर... ते बिचारे निमुटपणे हा ताण सहन करत राहते... पण किती दिवस\nचला मग, आता आपल्या मनाला थोडी विश्रांती देऊ या का असे करायचे, की घरातलाच एक कोपरा निवडायचा...अगदी कुठलाही... आणि तिथे सर्व शरीर सैलावून बसायचे... मग अलगद डोळे मिटायचे.. मनातील विचारांना, त्यांना हवे त्या दिशेला जाऊन द्यायचे.. पण आपण मध्ये लुडबुड करायची नाही हं.. आताचा वेळ हा फक्त आपल्या मनाचे ऐकायचा आहे... गम्मत म्हणजे, आपण घाईत असताना, कधी एकदा आपल्याला शांतपणा मिळेल याची वाट बघत असतो, पण जेंव्हा खरोखरच शांतपणे बसायची वेळ येते तेंव्हा ते वाटते तितके सोपे नाही हं... बरोबरच आहे, आपण कायम आपल्या मनाला मारून मुटकून एका कोपरयात बसवत असतो. आता आपण कोपरयात बसून मनाला हवे तसे बागडून द्यायचे म्हणजे काय असे करायचे, की घरातलाच एक कोपरा निवडायचा...अगदी कुठलाही... आणि तिथे सर्व शरीर सैलावून बसायचे... मग अलगद डोळे मिटायचे.. मनातील विचारांना, त्यांना हवे त्या दिशेला जाऊन द्यायचे.. पण आपण मध्ये लुडबुड करायची नाही हं.. आताचा वेळ हा फक्त आपल्या मनाचे ऐकायचा आहे... गम्मत म्हणजे, आपण घाईत असताना, कधी एकदा आपल्याला शांतपणा मिळेल याची वाट बघत असतो, पण जेंव्हा खरोखरच शांतपणे बसायची वेळ येते तेंव्हा ते वाटते तितके सोपे नाही हं... बरोबरच आहे, आपण कायम आपल्या मनाला मारून मुटकून एका कोपरयात बसवत असतो. आता आपण कोपरयात बसून मनाला हवे तसे बागडून द्यायचे म्हणजे काय\nपण या अवस्थेत काही वेळ गेल्यावर, खरच खूप खूप वेगळे वाटते.. थोड्या वेळाने आपण शांतपणे डोळे उघडतो तेंव्हा अगदी पुनर्जन्म झाल्यासारखे वाटते.. भिंतीवर पडलेला उन्हाचा कवडसाही वेगळे रूप घेऊन येतो आपल्यासाठी.. पानांची सळसळ, गच्चीतील कबुतरांचे मंद घुमणे, कुठेतरी दूर देवळात वाजणारी घंटा, स्वयंपाकघरात कढवल्या जाणारया लोण्याचा खरपूस वास, घरातील लहान मुलाचे खुदुखुदू हसणे, देवघरातील उदबत्तीचा मंद सुगंध, प्रेमाने रान्धलेल्या अन्नाची जिभेवर रेंगाळणारी चव या आणि अशा असंख्य गोष्टी आपल्या चेहेरयावर हसू उमटवतात.. कोंडलेला श्वास मोकळा होतो...आपण नव्याने सज्ज होतो... आयुष्याची लढाई लढण्यासाठी.. नव्हे, आयुष्य समरसून जगण्यासाठी....तेंव्हाच कुठेतरी जाणवते - खरच... Sometimes NOTHING is EVERYTHING....\nपुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन \nनमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...\nपुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन \nनमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...\nनमस्कार वाचकहो, बऱ्याच दिवसात काही लिहिलेच नव्हते. विषय सुचत बरेचसे, पण ते तसेच विरून जात. मुलाची नवीन शाळा, अहोंचे इथे नसणे, होणारी धावप...\nभारत माझा देश आहे…\nनमस्कार, सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा. गेल्या शुक्रवारी \"एअरलिफ्ट\" बघायला गेलो होतो. सुन्दर… निव्वळ अप्रतिम… ...\nप्रेम भावे जीव जगी या- अर्थात संगीत मानापमान..\nराष्ट्र आपले; प्रगती आपली; पण जबाबदारी ती कोणाची\nतूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार...\nरोपटे नात्यांचे - खुराक गप्पांचा..\nकधीतरी कुठेतरी छानसे वाचलेले...2\nकधीतरी कुठेतरी छानसे वाचलेले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/decrease-of-shares-after-the-reserve-bank-raised-the-repo-rate/", "date_download": "2018-08-18T08:00:41Z", "digest": "sha1:KJD6HCWHQ4BTX7L7HHALKHYKKDKFJDQX", "length": 6972, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आरबीआयने सलग दुस-या सत्रासाठी व्याजदरात केली वाढ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआरबीआयने सलग दुस-या सत्रासाठी व्याजदरात केली वाढ\nनवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर वाढवल्यानंतर बाजार मंदावले असून त्याचा परिमाण सेन्सेक्सवर सुद्धा झाला आहे. आरबीआयने आज सलग दुस-या सत्रासाठी व्याजदरात वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक शेअर बाजाराच्या निर्देशांक बुधवारी घसरला. एस ऍन्ड पी बीएसई सेंसेक्स 84.9 6 अंकांनी घसरून 37,521.62 वर बंद झाला.\nव्यापक निफ्टी50 आजच्या सकाळच्या व्यवहारात 11, 3 9 .55 या उच्चांकावर पोहोचला. गेल्या आठ दिवसांत सेन्सेक्सने 1255.35 अंकांची कमाई केली होती.\nआरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने (एमपीसी) रेपो दर 25 बेसिस पॉईंटने वाढवून 6.50 टक्के केला आहे. ऑक्टोबर 2013 पासून ही पहिलीच वेळ आहे की सलग पॉलिसी बैठकीत दर वाढवण्यात आला आहे.\nएचडीएफसी, भारती एअरटेल, वेदांत, टाटा स्टील, मारुती आणि आयसीआयसीआय बँक या कंपन्यांचे समभाग आज 1.24 टक्क्यांवरून 1.84 टक्क्यांनी घसरले. सेन्सेक्समध्ये प्रमुख कंपन्यांचे शेअर्स, टीसीएस, आयटीसी, सन फार्मा, पॉवर ग्रीड आणि ओएनजीसीचे शेअर 0.73 टक्के ते 3.1 9 टक्क्यांच्या दरम्यान वाढले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसमाज आणि स्पर्धा\nNext articleसाताऱ्यात अतिक्रमण विभागाची कारवाई\nजेट एअरवेजच्या संचालक मंडळाची बैठक होणार 26 ऑगस्टला\nचंदुकाका सराफ ऍन्ड सन्स च्या सौभाग्य अलंकार महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद\nधातू, ग्राहक वस्तू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी\nरुपया घसरल्यामुळे महागाई वाढणार\nमहाराष्ट्र बॅंकेचा “सिबिल’वर आधारित व्याजदर\nपोस्ट पेमेंट बॅंकेचे कामकाज आता उशिरा सुरू होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/celebrities/manasi-naik", "date_download": "2018-08-18T08:18:41Z", "digest": "sha1:ZAWWSBMHEGBCDKIVLCFEU7UW2NYS7RDA", "length": 1992, "nlines": 45, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Manasi Naik | Marathi Dhamaal", "raw_content": "\nउंची: 5 फूट 7 इंच (5'7\")\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation सुबोध भावे करणार प्राजक्ता माळीसोबत स्क्रिन शेअर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/muktapeeth/nirmal-yadav-writes-about-farmer-strike-50142", "date_download": "2018-08-18T08:25:13Z", "digest": "sha1:2PFBVCINUNZOAAVQ64FSLWAQXF5N5MR2", "length": 31020, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nirmal Yadav writes about Farmer Strike शेतकऱ्यांच्या संपाला कारण तुम्ही-आम्हीच...!! | eSakal", "raw_content": "\nशेतकऱ्यांच्या संपाला कारण तुम्ही-आम्हीच...\nरविवार, 4 जून 2017\nमानवसृष्टी आहे कि नाही अशी पुसटशीही शाश्वती नसलेल्या ग्रहाची चाचपणी करण्यासाठी ग्रहांवर उपग्रह सोडणाऱ्या देशात जिवंत माणसं न्यायासाठी, हक्कासाठी, सन्मानासाठी रोज मरतायत. हक्काची भिक मागतायत. पण सरकारला घाम फुटेल तर. सगळं, सगळं बदललंय, फक्त पोशिंदा आहे तिथेच आहे. किंवा त्यापेक्षा जास्त खोल गर्तेत ढकलला जातोय. आणि ढकलणारे कोण आहोत माहितेय तुम्ही-आम्ही...\nसध्या शेतकरी आंदोलन रस्ता आणि फेसबुक या दोन स्तरावर सुरू आहे. शेतकरी आपली ढेपाळलेली आर्थिक परिस्थिती सावरावी म्हणून रस्त्यावर उतरून लाल, पांढरा, हिरवा चिखल करताना दिसतोय. तो चिखल म्हणजे तुम्ही-आम्ही केलेली किंमत आहे शेतकऱ्याची. जिला त्यांनी फेसबुकवरून अधिकृतपणे स्पष्टता दिली आहे. तिही अतिशय निर्दयीपणे. इतकी की पुढचे काही वर्ष तरी भोलेनाथ फेसबुकवाल्यांची दुग्धधारा स्विकारणार नाही. कारण आपल्या सावत्र वागण्यामुळे आपण एक माणूस गमावलाय. कुठलाही अभ्यास न करता आपली मजल त्यांना करबूडवे ते तुच्छतेची अपमानास्पद वागणूक देण्यापर्यंत जाते. आंदोलन चिरडण्यासाठी त्यांना पोलिसीबळाचा वापर करून हाणमार केली जाते. सकाळी एक आजोबा म्हणाले, \"रझाकर परवडले\".\nशेतकरी आंदोलन का महत्वाचं आहे\nप्रसंग एक - काही कामानिमित्त वीसेक दिवसांपूर्वी कळंब तालुक्यातील नागझरवाडीला गेले होते. पोहचायला उशीर झाल्यामुळे काम उरकून परत यायला एसटी किंवा प्राईव्हेट वाहनही नव्हतं. मग तिथल्याच एका गावकऱ्याच्या घरी राहण्याचा प्रसंग आला. कुटुंब शेतकरी होत. त्यांच्यासाठी मी पूर्णपणे अनोळखी होते. काडीचाही विचार न करता त्यांनी मला त्यांच्या घरी माहेरभेटीला आलेल्या पोरीसारखं ठेवून घेतलं. संध्याकाळ झाली होती, मी राहणार आहे म्हटल्यावर लगबग सुरु झाली. घरातल्या तीनही सुना नुकत्याच शेतातून आल्या होत्या (म्हणजे भर उन्हाळ्यात त्या ४८ अंश सेल्शियस तापमानात त्या रोज काम करत होत्या कारण शेतात जरा १० रुपये जास्त भाव मिळेल म्हणून भाजीपाला लावला होता.) स्वयंपाकासाठी चुली पेटल्या होत्या. बशीत ओतलेला कोरा चहा पिणार तितक्यात घरातला धाकटा मुलगा कुठूनतरी बाहेरून आला होता. हातपाय धुतल्यावर निवांत आईशेजारी जाऊन बसला. माझी चौकशी चालू होती. ओळख-पाळख काढत काढता, बायकोने घरातल्या पोराच्या हातात चहा पाठवला. मोठी भावजय चपात्या करत होती, मधली दुसऱ्या चुलकांडावर कालवण, आई घरातल्या लेकरांना काय हवं नको बघत होती. तर या धाकट्याने बशीत चहा ओतला आणि एक-दोन घोट कसेतरी घेतले असतील. आईने मागमूस काढून सहज विचारल कसा झाला बाजार आणि या प्रश्नावर घरातलं वातावरण कोणीतरी मेल्यावर होतं तितकं किंबहुना त्यापेक्षा जास्त वाईट झालं होत. कारण घरातल्या लहानथोरांपासून खरडून २ दिवस-रात्र जागून टेम्पो भरून पाठवलेल्या भाजीपाल्याची मोजून २०००+ पट्टी आली होती. राहिलेला माल तो तिथंच मार्केटमध्ये रिता करून आला होता. टेम्पोचं भाड आणि बायांची मजुरी देखील खिश्यातून द्यावी लागणार होती. वीज, पाणी आणि घरच्या सगळ्याचं कष्ट तर मातीमोल झालं होत. गोठ्यात ३,४ गाई व एक म्हसाड असताना हा माणूस कोरा चहा पीत होता व शेजारी बसलेली आई घरातल्या वर्षाच्या पोरासाठी एका थडग्यात पाणी घालून दुधपावडर कालवत होती.\nप्रसंग दुसरा- साधारण वीसेक वर्षांपूर्वी म्हणजे १९९७ ला मी आणि माझी आई दिवसभर पालक, शेपू उपटून रात्रभर काडीकाडी जुळवून पेंड्या बांधून, गोठ्यातल्या गाईची पहाटेच धार काढून, डेरीला दुध घालून, सकाळी सातला येणाऱ्या पहिल्या भूम मुंबई या गाडीने जामखेडला गेलो होतो. कारण आईला कोणीतरी सांगितलं होत कि जामखेडला चांगला भाव मिळेल. रात्रभर आम्ही पैसे आल्यावर काय, काय करायचं याचा हिशोब पेंडीगनिक लावत होतो. पण तिथे गेल्यावर दुसरंच आमच्या पुढ्यात वाढून ठेवलं होत. मला अजूनही चांगलं आठवतय.. मार्केटमध्ये गेल्यावर चवाळ्यावर आई पेंड्या काढून लावत होती. मी कोपऱ्यावर मांडण्यासाठी एकेक दगड उचलून आणून लावत होते. तितक्यात मी आईला २,३ माणसांचा पडलेला गराडा पहिला. ते आईला गुत्तं मागत होते. एका पूर्ण पोत आणि गोणी भरून आणलेल्या भाजीचे ७५ रुपये. एक दलाल जाऊन दुसरा येत होता. कोणी ६५ रुपये, कोणी १०० तर कोणी ८०, ९० सगळी भाजी मागत होत. आई पहिल्यांदाच अश्या मोठ्या मार्केटमध्ये आलीय, शेतकरी आहे हे नवखेपण हेरून तिच्या हिरव्यागार सोन्याचा पाडून भाव मागणं सुरु होतं. पण ती बधली नाही आणि आईने एक पेंडी २ रुपये अशी विकायला सुरुवात केली होती. आता भाजी बघून गिऱ्हाईकांची गर्दी झाली होती. आतापर्यंत चारदोन पेंड्या विकल्याही होत्या. बहुतेक त्या दलालांना ते झेपलं नसावं म्हणून त्यांनी झाडून मार्केटमधून पालक, शेपू विकत घेऊन ५० पैसे या भावाने लावला. आणि आमच्याकडे येणार गिऱ्हाईक फक्त भाजीचा भाव विचारून, पेंडी हातात घेऊन, बघून-न्ह्याळून,झाडून दीड रुपयाला दोन, रुपयाला दोन अश्या मागू लागलं. आणि पुढे जाऊन ५० पैस्याची एक पेंडी अश्या दराने खरेदी करू लागलं. दुपारपर्यंत मोजून दाहेक पेंड्या विकल्या असतील. आम्ही दिवसभर फक्त भाव सांगत राहिलो. पाच वाजायला आल्यावर माझ्या आईने दोन पेंड्या घेतल्या माळव्याच्या पिशवीत घातल्या आणि मला काहीही न बोलता चालायला लागली. मी आई, आई म्हणून आवाज दिल्यावर एकदाही मागे वळून न पाहता मला चल असं म्हणून ती तरातरा पुढे चालत होती. त्या सगळ्यांनी आईला हरवल होत. मी सहज मागे वळून पाहिलं तर ती सकाळपासून ५० पैश्याला एक पेंडी अश्या भावाने भाजी विकणारी दलाल माणस भाजी भरून घेत होती. आणि सोबतच खदाखदा हसत होती. त्यावेळी एसटीत बसलेली माझी आई ढसढसा रडली होती. आजही मी एकट्यात असले कि तो खदाखदा हसण्याचा किळसवना आवाज माझ्या कानात घुमतो आणि लागुनच आईचं ते हमसून, हमसून रडण... मग मी लाखभर माणसांच्या जत्रेत का असेना. “या वीस वर्षात माझं अवतीभवतीच जग किती बदललय. फक्त बदललं नाही ते माझ्या शेतकरी असणाऱ्या आईचं, चुलता-चुलतीचं, शेतकरी भावाचं, अन्नदात्याचं.”\nया दोन प्रसंगामध्ये काळाचा सोडला तर कुठलाही बदल झालेला नाहीये. मानवसृष्टी आहे कि नाही अशी पुसटशीही शाश्वती नसलेल्या ग्रहाची चाचपणी करण्यासाठी ग्रहांवर उपग्रह सोडणाऱ्या देशात जिवंत माणसं न्यायासाठी, हक्कासाठी, सन्मानासाठी रोज मरतायत. हक्काची भिक मागतायत. पण सरकारला घाम फुटेल तर. सगळं, सगळं बदललंय, फक्त पोशिंदा आहे तिथेच आहे. किंवा त्यापेक्षा जास्त खोल गर्तेत ढकलला जातोय. आणि ढकलणारे कोण आहोत माहितेय तुम्ही-आम्ही, आपण झळाळल्या फूडमॉलमध्ये जाऊन आईस-टी सोबत पिझ्झा, पास्ता, पुटीन मागवणारे व अर्धीही डिश न संपवता हजार रुपये बिल व वरतून स्टेट्स जपलं जाव म्हणून पाडून टीप देणारे आज आपण अन्नाच्या नासाडी बद्दल बोलतोय, अन्न हे पूर्णब्रम्ह आहे अशी महती सांगत फिरतोय. किंवा काहीच काम नाही म्हणून आणि गार पंख्याच्या हवेखाली बसून, गॅलरीतल्या कुंड्याकडे बघत, बघत अन्ननासाडी व त्यावर सल्ले देतोय... चांगभलं बर कोणाला तर जो पिकवतो त्याला. पुस्तकी थेऱ्या वाचून, वाचून इतकही साध समजू नये कि हि नासाडी नव्हे तर प्रतीकात्मक होळी आहे.\nतिसरा आणि महत्वाचा मुद्दा हा आहे कि हा संप शहरी विरुद्ध ग्रामीण नसून सरकारविरुद्ध शेतकरी असा आहे (जरी शहरी विरुद्ध ग्रामीण असं चित्र रेखाटन्यात काही लोकं यशस्वी झालेतं) बाकी आपण उगीचच हळद लावून पिवळे होतोय. सात्विकतेचे सल्ले देतोय. किंवा नेहमीच शेतकरी आंदोलनाचा विषय निघाला कि स्वामिनाथन समितीच्या शिफारशी आजपर्यंत किती शेतकर्यांनी वाचल्यात, माहिती आहेत असा सवाल मुंबई-पुण्याचे तत्वज्ञ फेसबुकवर बसून विचारत राहतात. सरळ गणित आहे ते वाचत बसले असते तर तुम्ही कुठे तुमचं इतकं तत्वज्ञान पाजळल असतं आणि इतकीच हौस आलीय तर फेसबुकवर बसून विचारण्यापेक्षा गावोगावी जाऊन शिफारशींचं वाचन करावं. बाकी आंदोलनं हि कुठलीही मोजमापं, दोर्या लावून होत नसतात. हे म्हणजे पावसाला कसं पडायचं हे सांगण्यासारख झालं. तो काय कविता वाचनाचा नियोजित कार्यक्रम थोडीये. आणि तसंही त्यांना आज या क्षणी आपल्याला सल्ला देण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाहीये. जमत असेल तर पाठिंबा द्या किंवा पानाफुलांच्या, चंद्र-ताऱ्यांच्या फेसबुकवर गप्पा मारा.\nआपल्या समाजाला एक वाईट सवय आहे... काहीही झालं कि विरोधी पक्ष रुलिंग सरकार पडण्यासाठी हा सगळा खटाटोप करतय (तसं असू नये नाहीतरी विद्यमान सरकारातील लोकही विरोधी बाकावर बसून हेच धंदे करत होती. शेतकरी एकवटलाय यावरचं लक्ष हळूच असले खात्री नसलेल्या मूद्यांवर एकवटायचं. बाकी आंदोलनकर्त्यानीं सरकार आणि विरोधी बाक या दोन्हींकडे दुर्लक्ष करावं सरळ, सरळ) खरी शोकांतिका काय आहे तर कोणालाही असं वाटत नाही कि हा संप आजपर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांसाठी आहे. त्यांच्या विधवा पत्नीसाठी हा संप आहे. अनाथ आई-बापासाठी, पोरक्या लेकरांसाठीचा हा संप आहे. किमान यापुढे कोणी शेतकर्याने नरड्याला फास आवळू नये म्हणून हा संप आहे. शाळकरी पोरीने एसटी पाससाठी २६० रुपये नसल्यामुळे स्वतःला मृत्युच्या अधीन करू नये म्हणून आहे....शेतकरी बापाकडे लग्नासाठी पैसे नसल्यामुळे व मृत्यूला जवळ केल्यावर बापाच्या डोक्यावरील आपला बोज हलका होईल यामुळे आत्महत्या करणाऱ्या शितल घायाळ साठीचा म्हणून हा संप आहे...शहीद जवानपत्नीसाठी रडणारा महाराष्ट्र शहीद शेतकऱ्याच्या पत्नीसाठी कधी आश्रू ढाळणार आहे. डोळस सिलेक्टीव्हनेस आहे हा\nसरकारने काय करावं शेतकऱ्यांची कोरडवाहू, बागायतदार, अल्पभूधारक अशी विभागणी करायची थांबवावी. सध्यस्थितीत कर्जमाफी. शेतमालाला हमीभाव दयावा. खरं तर शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मिलिटरी स्कूलच्या धर्तीवर शाळा काढाव्यात व मोफत शिक्षण द्यावं. शेवटी तुम्हीच कोणीतरी लिहून ठेवलय अन्नदाता सुखी तर जग... ब्बास\nशेतकरी संप- फक्त पाठिंबाचं नाहीतर सहभाग.\nई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा -\nसंप मिटल्यामुळे काहींची दुकाने बंद: चंद्रकांत पाटील\nलंडनमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले; 7 ठार\nलंडन स्फोट : भारतीय संघाची सुरक्षा वाढविली\nमुंबई-गोवा मार्गावर अपघातात 2 जण ठार\nरेयाल माद्रिदने पटकाविले चँपियन्स लीगचे विजेतेपद\nसांगली, कोल्हापूरला भूकंपाचा सौम्य धक्का​\nनाशिकमध्ये शेतमालासाठी 'सुरक्षित कॉरिडॉर'​\n'''महाराष्ट्र बंद' उद्या होणारच; संप मिटलेला नाही''​\n'आश्‍वासने न पाळल्याने तावडेंनी राजीनामा द्यावा'​\nसंग्रामपूर : वाण धरण ६५ टक्के भरले\nसंग्रामपूर : सातपुडा पर्वतामधील तीन जिल्ह्यांसाठी जलसंजीवनी ठरलेले वाण धरण 65 टक्के भरले आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या ...\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nबारामती - विद्या प्रतिष्ठानच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पुरस्कार\nबारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nपंकज भूसे यांचा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव\nसरळगांव - महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी होऊन दिलेल्या उद्दिष्टा पेक्षा जास्त वृक्ष लागवड करून उत्कृष्ट कामगिरी केल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95", "date_download": "2018-08-18T08:58:44Z", "digest": "sha1:RB5Y3AVD4443Q67NCHSL2PICFBCY2JVB", "length": 22404, "nlines": 238, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/संपर्क - विकिपीडिया", "raw_content": "\nसामान्य माहिती (संपादन · बदल)\nतुम्ही भाषांतर कसे करता \nतुम्ही चपखल मराठी शब्द कसे शोधता\nवगळण्याकरिता नामांकन झालेले लेख\nयाहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki\nशब्द,पद आणि वाक्य संचय\nट्रांसलेटविकि ट्रांसलेटविकिचे मराठी सदस्य\nआत्ता हे जास्त सोपे झाले.\nइतर विविध समन्वय आणि लेख प्रकल्पातील भाषांतरण करणार्‍या सदस्यगटांचे दुवे येथे खाली द्यावेत.\nमध्यवर्ती सर्व लेखप्रकल्प यादी (संपादन)\nविकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प\nविकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प\nविकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वय विभाग (संपादन)\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वयचे मुख्यपान\nस्वागत आणि साहाय्य चमू\nमध्यवर्ती प्रकल्प सहाय्य विभाग (संपादन)\nदक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प\nविकिपीडिया:भाषांतर प्रकल्प संपर्क विभागाचे उद्देश नवे सहभाग इच्छूक सदस्य आकर्षित करणे अपेक्षीत कार्ये पूर्ण करण्यासाठी सदस्य संवादात सुलभता आणणे हा आहे.\n४ नमुना संवर्धन पत्र\n५ विकिपीडिया:वनस्पती प्रकल्पातसहभागी होण्याचे निमंत्रण\nIजर एखादा संपादक आपल्या प्रकल्पाशी संबधीत लेखात किंवा तत्सम योगदान करत असेल(आधी तयार पानांच्या इतिहासात योगदानकर्त्या सदस्यांची माहिती आढळू शकते.) तर, त्यांच्या सदस्य चर्चापानावर तुम्ही हा निमंत्रण साचा, त्यांना आपल्या प्रकल्पात निमंत्रित करण्याकरिता लावू शकता. {{subst:भाषांतरकरूया}}\nसाचा त्यांच्या पानावर लावा तुम्ही हा साचा subst ने परिस्फोटीत केलाच पाहिजे म्हणजे साचात अंतर्भूत सही तुमच्या सदस्य नावाने उमटू शकेल.\nअशा प्रकारचे निमंत्रण विकिपीडिया बाहेरिल संबधीत याहू,फेसबूक किंवा तत्सम कम्यूनिटीज वर पण द्यावे. तसेच विषयाशी संबधीत महाविद्यालये व विद्यापिठ विभाग प्रमूखांना पण इमेल द्वारे लिहावे म्हणजे योगदानाचा पाया विस्तृत करता येईल.\nखालील भाग मराठी विकिपीडियाच्या इतर प्रकल्पातून उदाहरण म्हणून दिला आहे. भाषांतर प्रकल्पास अनुरूप साचे खालील उदाहरणांवरून बनवून येथे खाली जोडावेत\nविकिपीडिया:वनस्पती प्रकल्पातसहभागी होण्याचे निमंत्रण[संपादन]\nनमस्कार, भाषांतर प्रकल्प/संपर्क आपण वनस्पती- किंवा वनस्पतीशास्त्र-विषयक लेखात जे योगदान केले आहे त्याबद्दल धन्यवाद. I'd like to invite you to become a part of विकिपीडिया:वनस्पती प्रकल्पाचा, एक विकिपीडिया:प्रकल्प aiming to improve coverage of plant-related articles on Wikipedia.\n Mahitgar ११:३६, २१ जुलै २००९ (UTC)\nविषय:वनस्पती प्रकल्पात सहभागी होण्याची विंनंती आपण वनस्पती किंवा वनस्पतीशास्त्र-विषयक क्षेत्रात जे योगदान केले आहे त्याबद्दल धन्यवाद. आपण इंटरनेटवरील लोकप्रिय मराठी विकिपीडिया संकेतस्थळाच्या भेट देऊन वनस्पतॉ दालनाचे आवलोकन करून मराठी विकिपीडिया वनस्पती मित्र परिवाराचा एक सदस्य या नात्याने\nस्वागत भाषांतर प्रकल्प/संपर्क, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे\nआवश्यक मार्गदर्शन भाषांतर प्रकल्प/संपर्क, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.\nमराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ५१,७६० लेख आहे व २५० सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.\nनवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nकृपया प्रताधिकरित असलेली पुस्तकांपासून किंवा वेबसाइटवरून मजकूर नकल-डकव करू नका. असे केल्यास आपल्याला तडीपार करण्यात येईल. (जर आपण लेखक/मालक असाल तर, आपण योग्य प्रक्रियेचे अनुसरण करणे आवश्यक आहे). तटस्थ बिंदू दृश्य मध्ये सामग्री जोडा. आपली सामग्री सुधारण्यासाठी स्रोत उद्धृत करा.\nशुभेच्छा आणि सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन\nआपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा\nआपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.\nदृश्यसंपादक सजगता मालिका :\nदृश्यसंपादकात मेनुबार वापरण्यास प्राधान्य द्या. दृश्यसंपादकात [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप वापरणे टाळा. दृश्यसंपादकात प्रत्येक शब्दाचे लेखन झाल्या नंतर स्पेस द्या.\nदृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)\nविकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ सप्टेंबर २००९ रोजी १९:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/430/Chindhi-Bandhate-Draupadi.php", "date_download": "2018-08-18T08:36:01Z", "digest": "sha1:IBT7AI34PNWPY3EU2JU6XCGUJ2YUPJPR", "length": 10710, "nlines": 156, "source_domain": "www.gadima.com", "title": "Chindhi Bandhate Draupadi -: चिंधी बांधिते द्रौपदी : ChitrapatGeete-Popular (Ga.Di.Madgulkar|Asha Bhosle|Sudhir Phadke) | Marathi Song", "raw_content": "\nहस्ति सर्व संपदा,मस्तकात शारदा\nअसे असून दिनसा,झुरसी काय व्यर्थ तू,माणसा समर्थ तू\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nचित्रपट: झेप Film: Zeph\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nचिंधी बांधिते द्रौपदी हरिच्या बोटाला \nचिंधी बांधिते द्रौपदी हरिच्या बोटाला\nबघून तिचा तो भाव अलौकीक\nमनी कृष्णाच्या दाटे कौतुक\nकर पाठीवर पडला अपसुक\nचिंधी बांधिते द्रौपदी, हरिच्या बोटाला \nम्हणे खरी तू माझी भगिनी\nभाऊ तुझा मी दृपद नंदिनी\nसाद घालिता येईन धावुनी\nप्रसंग जर का पडला\nचिंधी बांधिते द्रौपदी हरिच्या बोटाला \nप्रसंग कैसा येईल मजवर\nपाठीस असशी तू परमेश्वर\nबोले कृष्णा दाटून गहिवर\nचिंधी बांधिते द्रौपदी, हरिच्या बोटाला \nकविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)\nमहाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.\nदूर राहिले जग स्वार्थाचे\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE.php", "date_download": "2018-08-18T09:10:18Z", "digest": "sha1:SR4G2KQA77KX22H66PYWTLZABZXE76OY", "length": 81741, "nlines": 1229, "source_domain": "tarunbharat.org", "title": "द्रविड राजकारणाच्या अंताचा प्रारंभ… | Tarun Bharat", "raw_content": "\nवीर संघवी, ज्येष्ठ पत्रकार\nउजव्या विचारसरणीला एक मंच उपलब्ध होईल म्हणून पुद्दुचेरी साहित्य उत्सव रद्द करण्याची डाव्यांची मागणी विचित्र...\nप्रशांत उमराव, वकील, सर्वोच्च न्यायालय\nमेरठमध्ये हेलिकॉप्टरमधून शिवभक्त कावडियांवर फुलांचा वर्षाव करणारे मेरठ भागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांना...\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळात एकाच दिवशी शंभर बळी\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nआयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ\nअजित वाडेकर यांचे निधन\nकेरळमध्ये पावसाचे ७७ बळी; १८ हजार बेघर\nवीर संघवी, ज्येष्ठ पत्रकार\nAll अर्थ कृषी नागरी न्यायालय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nआयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ\nअजित वाडेकर यांचे निधन\nसीआरपीएफला सर्वाधिक शौर्य पदके\nमहाराष्ट्राला ५१ पोलिस पदके\nहवाई दल जवानाच्या वेषात अतिरेकी\nराजीव गांधींनीच नाकारला होता दलितांचा हक्क\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nरस्ता सुरक्षा विषय अभ्यासक्रमात असावा\nडिजिटल व्यवहारांवर २० टक्के कॅशबॅक\nघर, वाहनकर्ज महागले; व्याजदरात ०.२५ टक्क्यांची वाढ\nमहसूल वाढल्याने जीएसटी घटणार\nनिर्देशांक नव्या विक्रमी उच्चांकावर\n‘डिमांड ड्राफ्ट’च्या नियमात बदल\nडॉलरसमोर रुपया सक्षम, मोदी सरकार धैर्यवान\nदेशभर आज जीएसटी दिवस पाळणार\nआर्थिक सल्लागार भारतीय मूल्ये जोपासणारा असावा\nसरकारी बँकांमध्ये लोकांचा पैसा सुरक्षित\nनागरिकांना प्रामाणिकपणे कर भरण्याची विनंती\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nविदर्भ, मराठवाड्यातील आठ सिंचन प्रकल्पांना केंद्राची मदत\nयंदा ९७ टक्के पाऊस\nहमीभावात दीडपट वाढ होणारच\nशेतीपर्यंत पाणी नेण्याची गरज : नितीन गडकरी\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nआयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ\nअजित वाडेकर यांचे निधन\nसीआरपीएफला सर्वाधिक शौर्य पदके\nमहाराष्ट्राला ५१ पोलिस पदके\nहवाई दल जवानाच्या वेषात अतिरेकी\nराजीव गांधींनीच नाकारला होता दलितांचा हक्क\nरस्ता सुरक्षा विषय अभ्यासक्रमात असावा\nछत्तीसगडचे राज्यपाल बलरामजी दास टंडन यांचे निधन\nउच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र\nआंदोलनात कोट्यवधींची संपत्ती नष्ट होणे भीषणच\nराजीव गांधींच्या मारेकर्‍यांना मुक्त करण्यास केंद्राचा नकार\nबार डान्समध्ये अश्‍लील काय\nनॅशनल हेरॉल्ड प्रकरणी राहुल गांधींना दिलासा नाही\nक्रमांक ३ वरच न्या. जोसेफ यांचा शपथविधी\nजम्मू-काश्मीरच्या कलम ३५-ए वर उद्या सुनावणी\nतीन न्यायमूर्तींची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती\nन्यायाधीशपदी नातेवाईकांच्या नियुक्तीला चाप लागणार\nपीडित बालकांच्या कुठल्याही छायाचित्राला प्रसिद्धी नको\nशबरीमलात महिलांनाही प्रवेशाचा अधिकार\nपंतप्रधान मोदींनी दिल्या इम्रान खान यांना शुभेच्छा\nट्रम्प यांना प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे निमंत्रण\nकाश्मीरची बदनामी करणार्‍या रिपोर्टमागे पाकिस्तानचा हात\nकोरियन द्वीपकल्पातील शांतता प्रक्रियेत भारताचा सहभाग\nभारत घेणार रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली\nसेशेल्समध्ये भारत उभारणार नाविक तळ\nऑगस्टावेस्टलँड : दलालाचे प्रत्यार्पण करण्यास इटलीचा नकार\nराष्ट्रपती तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना\nभारत-ब्रिटनमध्ये होणार प्रत्यार्पण करार\nबांगलादेश परत घेणार आपले ३३ घुसखोर\nइराणवरील बंधनांना भारताचा पाठिंबा नाही\nवाटले नव्हते, ही व्यक्ती पंतप्रधान होईल\nपंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा नाही : शरद पवार\nघुसखोरांचे आदरातिथ्य करायचे का\nएक राष्ट्र, एक निवडणुकीला काँग्रेसचा विरोध\nमोदी सरकारविरुद्ध आंदोलन उभारणार\nअमित शाह महिन्यातून तीन दिवस बंगाल मुक्कामी…\n१७ विरोधी पक्षांना हवी मतपत्रिका\n…तर भारतात रक्ताचे पाट वाहतील\nकाँग्रेसने मान्य केला बोफोर्स घोटाळा\nखटल्याच्या भीतीने राहुल यांचे ते भाषणच काढले\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\nबुलेट ट्रेनसाठी बीईएमएल बनवणार सुटे भाग\n‘बुल’ उधळला: विक्रमी उच्चांकावर विराजमान\nकाँग्रेसच्या भीतीने हादरला होता शेअर बाजार\nभारती एअरटेल, पेमेंट बँकेचा ईकेवायसी परवाना रद्द\nदूरसंचार क्षेत्रात ७५ हजार कर्मचार्‍यांना नारळ\nऐतिहासिक… निर्देशांक ३३ हजारी\nगुंतवणूकदार २५ लाख कोटींनी मालामाल\nरजनीशकुमार स्टेट बँकेचे नवे अध्यक्ष\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nभारतातच तयार होणार सुपर हॉर्नेट\nआयआरएनएसएस-१ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nनेव्हिगेशनल उपग्रहाचे उद्या प्रक्षेपण\n‘जी-सॅट-६ ए’ चे यशस्वी प्रक्षेपण\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nसंरक्षण मंत्रालयाकडून व्यवहार नाही\nसीमेजवळ तैनात होणार चिनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॉकेट\nलष्कराला मिळणार ४०० आधुनिक तोफा\nभीष्म व अजेय रणगाड्यांना स्वदेशी इंजीन\nसीआरपीएफ जवानांना नवे बुलेट प्रूफ जॅकेट\nइसिसचा अतिरेकी अडकला गुप्तचर यंत्रणेच्या जाळ्यात\nसौराष्ट्र सीमेवर पाकची लढाऊ विमाने\nकोणत्याही आव्हानासाठी लष्कर सज्ज\nअग्नी-५ लवकरच लष्कराच्या शस्त्रागारात\nजवानांना १० हजार रुपये कापड भत्ता\nसर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ आला समोर\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nरोहिंग्या निर्वासित नसून, बेकायदेशीर घुसखोरच : किरेन…\n६१,१६४ किमी महामार्गाची कामे सुरू\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान :…\nस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\nनोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन\nपाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात\n२१ हजारांपेक्षा जास्त भारतीयांचे अमेरिकेत अनधिकृत वास्तव्य\nइराणविरोधात अमेरिकेचे एकतर्फी कठोर फेरनिर्बंध\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान :…\nस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\nनिवडणूक नियमाचे उल्लंघन, इम्रान खान यांचा लेखी…\nइम्रान खान यांना खासदारकीची शपथ घ्यायला सशर्त…\n६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू\nअंटार्क्टिकात तुटला अतिविशाल हिमनग\nनोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन\nभारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था\nमल्ल्याची इंग्लंडमधील मालमत्ता जप्त करण्याचे आदेश\nरासायनिक शस्त्रास्त्र वापर बंदीसंबंधित परिषदेला भारताचा पाठिंबा\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nकॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा\nमुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी\nराज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड\nमराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार\nसमृद्धी महामार्गासाठी एकराला ५० लाख रुपये\n‘चाकण पेटवणार्‍या’ पाच हजार जणांवर गुन्हा\nकमी शब्दात व धारदार पोस्ट असावी\nआता घेता येणार वारीचे लाईव्ह दर्शन\nकर्जमाफी कायमस्वरूपी तोडगा नाही : उपराष्ट्रपती\nऔरंगाबादेत पाणीयुद्ध; नळ कापण्यावरून दोन गटात भीषण…\nआता अयोध्येत मंदिर बांधण्यासाठी जाणार\nवंचितांना यमगरवाडी प्रकल्पाने मुख्य प्रवाहात आणले: भैय्याजी…\nनांदेड महानगरपालिकामध्ये कॉंग्रेसची सत्ता\nमुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी\nतुम्ही फक्त चित्रपट दाखवण्याचे काम करा\nसत्ता मिळाली नाही तरी चालेल, पण भाजपा…\nभाजपाने काँग्रेस, राकाँ फोडली असती, म्हणूनच सत्तेत…\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे…\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nगामा पैलवानसह सहा आरोपी अटकेत\nआजपासून फिफा विश्‍वचषकाची जादू\n फुलराणीने दिले २६ वे सुवर्णपदक\nभारताची सुवर्णझळाळी; एकाच दिवशी १७ पदकांची लूट\nतेजस्विनी, अनिश, बजरंगला सुवर्ण\nकुस्तीपटूंना दोन सुवर्णांसह चार पदके\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nशेअर बाजार नव्या शिखरावर\nशेअर बाजाराचा बैल उधळला\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nध्रुपद गायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे निधन\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nतेरा वैभव अमर रहे माँ\nतेरा वैभव अमर रहे माँ\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\n७३ टक्के नागरिकांचा पंतप्रधान मोदींवर विश्‍वास\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\n‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित\nचिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार\nप्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\nअटल, अढळ आणि अमर…\nअटलजी आजचे श्यामाप्रसाद आहेत\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nअटल, अढळ आणि अमर…\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\nअटलजी आजचे श्यामाप्रसाद आहेत\nमेरा परिचय : अटलजींच्या काव्यप्रतिभेतून प्रकटलेले हिंदुसूक्त\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन…\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nराष्ट्रीय एकता दिनानिमित्त ‘एकतेसाठी दौड’\nपरराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज भूतानमध्ये\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची श्री मंजुनाथस्वामी मंदिरात…\nदशम: सौंदर्यलहरी पारायणोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरूत\nनरेंद्र मोदी यांचे नवे मंत्रिमंडळ\nनव्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन्\nश्री गजानन महाराजांची पालखी पंढरपूर वारीहून परतली\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम…\nविधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान\nAll ई-आसमंत ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१२ ऑगस्ट १८ आसमंत\n०५ ऑगस्ट १८ आसमंत\n२९ जुलै १८ आसमंत\n२२ जुलै १८ आसमंत\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१५ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१४ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n०९ मे १८ सदाफुली\n२७ डिसेंबर १७ सदाफुली\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१५ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१४ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळात एकाच दिवशी शंभर बळी\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…\nवृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…\nजनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nवृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…\nस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\n►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…\n►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…\nकॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा\n►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…\nमुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी\n►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…\nराज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड\n►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…\nतेरा वैभव अमर रहे माँ\n॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…\n॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…\n॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…\n‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित\nअभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…\nचिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार\nऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…\nसंजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…\nसूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49\nHome » उपलेख, श्रीनिवास वैद्य, संपादकीय, स्तंभलेखक » द्रविड राजकारणाच्या अंताचा प्रारंभ…\nद्रविड राजकारणाच्या अंताचा प्रारंभ…\nद्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे संस्थापक आणि सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांच्या निधनाने तामिळनाडूच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. हे त्यांचे कट्टर विरोधकही मान्य करतील, यात शंका नाही. करुणानिधी एक वादळी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी त्यांच्या पद्धतीने राजकारण केले. तसे राजकारण दुसर्‍यांना, अगदी त्यांच्या मुलांनाही जमेल की नाही, सांगता येत नाही. याचे एक उदाहरण आपण महाराष्ट्रात बघतच आहोत. करुणानिधी यांच्या निधनानंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू, विविध माध्यमांतून समोर येत आहेत. मरण पावल्यावर त्या व्यक्तीशी वैर संपवायचे असते, अशी आपली संस्कृती सांगते. परंतु, जी व्यक्ती आपली संस्कृती मानत नव्हती, धर्म मानत नव्हती, तिच्या बाबतीत हा दंडक पाळणे आवश्यक नाही. सोनिया गांधींचे वेगळे आहे. त्या राजकारणी आहेत आणि राजकारणात कुणाची मदत केव्हा लागेल सांगता येत नाही. त्यातच सत्ताप्राप्ती हेच ध्येय असलेल्या राजकीय पक्षांचे तर हे धोरणच असते. सोनिया गांधींनी, करुणानिधी यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना म्हटले की, ते मला पितृतुल्य होते. माझी वैयक्तिक हानी झाली आहे. राजकीय अपरिहार्यतेमुळे सोनिया गांधी, करुणानिधींचा भूतकाळ विसरू शकतात. परंतु, तशी अपरिहार्यता सामान्यांना नसते.\nकेंद्रातील इंद्रकुमार गुजराल यांच्या सरकारमध्ये द्रमुक सहभागी होता व त्याला काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा होता. राजीव गांधी यांची हत्या ज्यांनी घडवून आणली, त्या लंकेतील लिट्टे दहशतवादी संघटनेशी द्रमुक पक्षाचे घनिष्ठ संबंध होते. असे म्हणतात की, लिट्टेला सर्व प्रकारची म्हणजे आर्थिक व शस्त्रास्त्रांची मदत द्रमुक पक्षाकडून होत होती. या आरोपावरून सोनिया गांधी यांनी इंद्रकुमार गुजराल यांचे सरकार पाडले. एवढेच नाही, तर याच आरोपावरून तामिळनाडूतील करुणानिधी यांचे बहुमतातील सरकार राज्यपालांकरवी बरखास्त करविले. वैरत्वाची भावना इतकी तीव्र होती की, सूड उगविण्यासाठी सोनिया गांधींनी संविधानाच्या तरतुदीदेखील बाजूला सारल्या. असे असताना, २००४ साली केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी निर्लज्जपणे द्रमुकचे समर्थन घेेण्यात आले. २००४च्या निवडणुकीपर्यंत वाजपेयींच्या सरकारमध्ये सहभागी असलेला द्रमुक पक्ष एक क्षणात सोनिया गांधींच्या आश्रयाला गेला. डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारमधील द्रमुकच्या ए. राजा या मंत्र्याने नंतर काय धिंगाणा घातला, हे सर्वज्ञात आहे. भ्रष्टाचाराच्या प्रचंड आरोपांमुळे संपुआचे हे सरकार निवडणुकीत हारले. त्यात ए. राजा यांनी केलेला टू-जीचा घोटाळा प्रमुख होता. तरीही सोनिया म्हणत असतील की, करुणानिधी गेल्यामुळे माझी वैयक्तिक हानी झाली, तर त्या धन्य आहेत\nअयोध्येत राममंदिराच्या जागेवरच (जिथे बाबरी मशीद बांधली होती) भव्य राममंदिर बांधण्यासाठी आंदोलन सुरू असताना, अनेक विद्वान आपली अक्कल पाजळत होते. त्या वेळी करुणानिधींनी म्हटले की, आज जर राम जिवंत असता, तर बाबरी मशिदीच्या ऐवजी दुसर्‍या जागेवर त्याचे मंदिर बांधले म्हणून तो नाराज झाला असता काय बाबरी मशिदीचाच हट्ट का म्हणून बाबरी मशिदीचाच हट्ट का म्हणून असे म्हणणार्‍या करुणानिधींवर काळाने कसा सूड उगवला ते बघा असे म्हणणार्‍या करुणानिधींवर काळाने कसा सूड उगवला ते बघा मरिना बीचवरच अंत्यसंस्कार व्हावा म्हणून करुणानिधींच्या पुत्राला रात्री उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. म्हणजे करुणानिधींचा अंत्यसंस्कार मरिना बीचवरच झाला पाहिजे आणि रामाचे जन्मस्थान मंदिर मात्र दुसरीकडे बांधले तरी चालेल मरिना बीचवरच अंत्यसंस्कार व्हावा म्हणून करुणानिधींच्या पुत्राला रात्री उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. म्हणजे करुणानिधींचा अंत्यसंस्कार मरिना बीचवरच झाला पाहिजे आणि रामाचे जन्मस्थान मंदिर मात्र दुसरीकडे बांधले तरी चालेल भारत आणि श्रीलंकेला जोडणारा ऐतिहासिक रामसेतू तोडण्याचे कारस्थान द्रमुक पक्षाचेच होते. त्या वेळी करुणानिधी म्हणाले होते की, रामाने हा सेतू बांधला म्हणता. पण त्याने कुठल्या कॉलेजातून इंजिनीअरिंगची पदवी घेतली होती, हे सांगा.\nकरुणानिधी अत्यंत गरीब परिवारातून आलेले होते. नास्तिकता, कम्युनिस्ट विचारसरणी, आर्य-द्रविड वंशवाद, उत्तर-दक्षिण भारत भेदभाव इत्यादींच्या आधारे त्यांनी ६० वर्षे तामिळनाडूच्या राजकारणात धुमाकूळ घातला. अमाप म्हणजे डोळे पांढरे होतील इतकी संपत्ती गोळा केली. हे त्यांचे ‘कर्तृत्व’ फिके पडावे असे एक कर्तृत्व त्यांच्या खाती आहे. ते म्हणजे तामिळनाडूतून हिंदू संस्कृती, हिंदू धर्म आणि ब्राह्मण यांना संपविण्याचा खटाटोप. त्यासाठी त्यांनी आपली लेखणी, वक्तृत्व, राजकीय शक्ती पणाला लावली. ब्राह्मणांना या राज्यात राहणे किती असह्य झाले होते, याचे अनुभव कुठलाही तमीळ ब्राह्मण सांगू शकतो. द्रविड आणि आर्य या दोन स्वतंत्र संस्कृती आहेत आणि आर्यांनी द्रविडांवर आक्रमण करून त्यांना दक्षिणेत हुसकावून लावले, हा करुणानिधींचा अत्यंत आवडता सिद्धान्त. त्यामुळे त्यांनी आर्यांचे प्रतिनिधी म्हणून ब्राह्मणांवर जबरदस्त सूड उगवला. कम्युनिस्टांच्या मदतीने इतिहासात वाट्टेल तसे बदल करून, वामपंथी इतिहास शाळेत शिकविला. आज जो आपल्याला उत्तर व दक्षिण भारतीयांमध्ये भेदभाव दिसतो आहे, त्याला खतपाणी देण्याचे काम करुणानिधींनी मनोभावे केले. हिंदू धर्म, हिंदू संस्कृती यांच्याबद्दल करुणानिधी यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. रावणाला पूर्वज मानून दसर्‍याला रामदहनाचे कार्यक्रमही करुणानिधी घेत असत. अशा या ‘कर्तृत्वसंपन्न’ राजकारण्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते चेन्नईत पोहचले होते. राजकारण आणि त्यातही सत्ता, व्यक्तीला किती लाचार करते, याचे हे ताजे उदाहरण आहे. पण म्हणून, हा देश एक राहावा यासाठी धडपडणार्‍यांनी, हा इतिहास विसरावा असे नाही.\nकरुणानिधींनी ज्या विचारसरणीचा आयुष्यभर पुरस्कार केला, ती किती ठिसूळ होती, याचे पुरावे आता समोर येऊ लागले आहेत. करुणानिधी गंभीर आजारी असताना, त्यांच्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून, त्यांची कन्या खा. कनिमोळी राज्यातील प्राचीन मंदिरांना भेटी देऊन नवस बोलत होत्या. धार्मिक अनुष्ठाने केलीत. हिंदू संस्कृतीचा प्रचंड तिरस्कार म्हणून आपल्या मुलाचे नाव, कल्पनातीत नरसंहार करणार्‍या कम्युनिस्ट हुकूमशहा स्टॅलिनवर ठेवणार्‍या करुणानिधींचा आणि त्यांच्या विचारधारेचा हा दारुण पराभवच मानावा लागेल.\nतत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या अपरिपक्व निर्णयामुळे लंकेत भारतीय सेना गेली होती. तिथे लिट्टेशी लढताना लष्कराचे २१४ जवान शहीद झाले होते. परंतु, भारताने ही कारवाई थांबवावी म्हणून करुणानिधी उपोषणाला बसले होते. भारतीय जवान शहीद होत आहेत याचे त्यांना दु:ख नव्हते. लिट्टेचे दहशतवादी मरू नये म्हणून ते अस्वस्थ होते. अशा व्यक्तीच्या अंत्ययात्रेत त्यांच्या पार्थिवाला लष्करी सन्मान देताना, तसेच त्याच्या बाजूने लष्करी शिस्तीत चालताना, भारतीय जवानांच्या मनात काय विचार येत असतील\nद्रविड राजकारणाने तामिळनाडूचे प्रचंड नुकसान केले आहे. तमीळ लोकांमध्ये भारतापासून फुटून नवा देश तयार करण्याची भावना याच राजकारणाने निर्माण केली आहे. लिट्टेला जो पाठिंबा होता, तो याच कारणाने होता. श्रीलंकेत तमीळभाषकांवरील अत्याचार हाच केवळ मुद्दा असता, तर करुणानिधी यांची वागणूक निश्‍चितच वेगळी राहिली असती. परंतु, ते तसे नव्हते. त्यांना तमिळांचा वेगळा देश हवा होता आणि त्यासाठी तमीळ संस्कृती ही हिंदू संस्कृतीपासून किती वेगळी आहे, हे दाखविण्यासाठी ते प्रयत्नीशील होते. हिंदी भाषेचा द्वेषही याच द्रविड राजकारणाने शिकविला आहे. याच राजकारणामुळे राज्यातील बुद्धिमत्ता, प्रतिभा दुसर्‍या राज्यात गेली. हे नुकसान रुपयांनी मोजता येणार नाही. त्यामुळे द्रविड राजकारण संपणे, काळाची गरज आहे. ते सर्वांच्याच हिताचे आहे. त्यासाठी द्रमुक पक्ष खिळखिळा व्हायला हवा. या पक्षाचे सर्वसामान्य मतदार भाविक आहेत, परंपरा मानणारे आहेत. फक्त नेतृत्व नष्ट व्हायला हवे. रजनीकांत यांच्या रूपाने तशी आशा दिसत आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणावर सहा दशके प्रभाव पाडणारे एक राजकारणी म्हणून करुणानिधी यांचे निधन पोकळी निर्माण करणारे असले, तरी देशाच्या दृष्टीने ही घटना, द्रविड राजकारणाच्या अंताचा प्रारंभ ठरावा, अशी आशा आहे…\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\nअटल, अढळ आणि अमर…\nFiled under : उपलेख, श्रीनिवास वैद्य, संपादकीय, स्तंभलेखक.\nआजपासून फिफा विश्‍वचषकाची जादू\n फुलराणीने दिले २६ वे सुवर्णपदक\nभारताची सुवर्णझळाळी; एकाच दिवशी १७ पदकांची लूट\nतेजस्विनी, अनिश, बजरंगला सुवर्ण\nकुस्तीपटूंना दोन सुवर्णांसह चार पदके\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळात एकाच दिवशी शंभर बळी\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nSAMB on मग न्यायाधीशांसाठी तरी का उभे राहायचे\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nमग न्यायाधीशांसाठी तरी का उभे राहायचे\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\n७/१२ प्रभागाचा : सोलापूर महानगरपालिका निवडणूक २०१७\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (150) आंतरराष्ट्रीय (467) अमेरिका (166) आफ्रिका (7) आशिया (259) ऑस्ट्रेलिया (2) युरोप (32) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (1) ई-पेपर (159) ई-आसमंत (59) ई-मराठवाडा (48) ई-सदाफुली (4) ई-सोलापूर (48) कलाभारत (4) किशोर भारत (2) क्रीडा (20) छायादालन (36) ठळक बातम्या (8) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (886) आसमंत (841) मानसी (10) युवा भरारी (9) विविधा (4) सदाफुली (22) फिचर (16) महाराष्ट्र (435) उ.महाराष्ट्र (3) प.महाराष्ट्र (15) मराठवाडा (5) मुंबई-कोकण (87) विदर्भ (11) सोलापूर (17) रा. स्व. संघ (48) राज्य (738) आंध्र (12) ईशान्य भारत (42) उत्तर प्रदेश (100) ओडिशा (3) कर्नाटक (80) केरळ (31) गुजरात (98) गोवा (11) जम्मू-काश्मीर (94) तामिळनाडू (35) दिल्ली (52) पंजाब-हरयाणा (28) बंगाल (31) बिहार-झारखंड (66) मध्य प्रदेश-छत्तीसगड (21) राजस्थान (21) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,864) अर्थ (76) कृषी (25) नागरी (822) न्यायालय-गुन्हे (262) परराष्ट्र (83) राजकीय (261) वाणिज्य (13) विज्ञान-तंत्रज्ञान (35) संरक्षण (143) संसद (126) सांस्कृतिक (18) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (5) संपादकीय (795) अग्रलेख (382) उपलेख (412) साहित्य (11) स्तंभलेखक (1,031) अजय देशपांडे (34) अपर्णा क्षेमकल्याणी (10) अभय गोखले (25) अविनाश कोल्हे (10) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (29) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (45) डॉ.परीक्षित स. शेवडे (30) डॉ.वाय.मोहितकुमार राव (28) डॉ.सच्चिदानंद शेवडे (28) तरुण विजय (9) दत्ता पंचवाघ (10) दीपक कलढोणे (36) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (3) ब्रि. हेमंत महाजन (55) भाऊ तोरसेकर (111) मल्हार कृष्ण गोखले (52) यमाजी मालकर (35) योगानंद काळे (1) रत्नाकर पिळणकर (27) रमेश पतंगे (11) रविंद्र दाणी (57) ल.त्र्यं. जोशी (19) वसंत काणे (18) श्याम परांडे (20) श्याम पेठकर (55) श्यामकांत जहागीरदार (57) श्रीकांत पवनीकर (10) श्रीनिवास वैद्य (48) सतीष भा. मराठे (6) सुधीर पाठक (6) सुनील कुहीकर (52) सोमनाथ देशमाने (34) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (26)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nMore in उपलेख, श्रीनिवास वैद्य, संपादकीय, स्तंभलेखक (29 of 1456 articles)\nदुसर्‍या महायुद्धात मदत स्वीकारूनही भारताच्या स्वातंत्र्याबाबत उदासीन धोरण स्वीकारून बसलेल्या इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी म्हणून महात्मा गांधींनी जाहीर केलेल्या ‘भारत छोडो’ ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.solapurcorporation.gov.in/(X(1)S(vxezod451ws3yh45n2rzhu55))/English/eng%20smc%20external%20links.aspx", "date_download": "2018-08-18T08:43:19Z", "digest": "sha1:7VZJELEIQFA3S4O737FMTECJR5V56RRW", "length": 3149, "nlines": 72, "source_domain": "www.solapurcorporation.gov.in", "title": "Welcome to Solapur Municipal Corporation, Solapur.", "raw_content": "\n1 १५ अॉनलाईन सेवा Open File\n4 ई-गव्हर्नन्स Open File\n5 मा.महाराष्ट्र शासन Open File\n6 मा.राज्य निवडणूक आयोग Open File\n7 मा.नगरविकास विभाग Open File\n8 मा. भारत सरकारची स्मार्ट सिटी च्या सुचनेकरीताची वेबसाईट Open File\n9 मा. भारत सरकारच्या वेबसाईटवर सोलापूर शहर स्मार्ट संबंधी करावयाच्या सूचना Open File\n10 म.न.पा.ची स्मार्ट सिटी संदर्भात सूचना करावयाची वेबसाईट Open File\n11 म.न.पा.चे स्मार्ट सिटी संदर्भातचे Facebook Page Open File\n12 परफॉर्मन्स आस्सेस्मेंट सिस्टम Open File\n13 डॉ. कोटणीस मेमोरियल Open File\n14 सोलापूर महानगरपालिका अलर्ट सिस्टम Open File\n15 सोलापूर स्मार्ट सिटी प्रोपोजल Open File\n16 प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाइन रजिस्त्रेशन Open File\n17 प्रभाग नंबर प्रमाणे मतदान अधिकारी यादी Open File\n18 १० वी व १२ वी च्या स्कॉलरशिप बाबतची मा. महाराष्ट्र शासनाची वेबसाईट Open File\n19 सोलापूर महापालिका निवडणूक प्रारुप मतदार याद्या Open File\n20 डिजीटल इंडिया Open File\n21 मतदार यादीमध्ये नाव शोधण्यासाठीची वेब साईट Open File\n22 प्रोपर्टी टॅक्स सोलापूर सिटी Open File\n23 सोलापूर महानगरपालिका AutoDCR Open File\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/celebrities/amruta-subhash", "date_download": "2018-08-18T08:18:43Z", "digest": "sha1:2IC6NBLMBCZASALG2KCEF7FXZ62IEQ7J", "length": 2060, "nlines": 47, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Amruta Subhash | Marathi Dhamaal", "raw_content": "\nउंची: 5 फूट 1 इंच (5'1\")\nजो़डीदाराचे नाव: संदेश कुलकर्णी\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation कॅनेडियन पॉलाची मराठी शिकण्यासाठी खास मेहनत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=436&Itemid=626&limitstart=3", "date_download": "2018-08-18T08:13:16Z", "digest": "sha1:PW5URSEEIOSBYQ7NPND3X2NYOKZNX3SV", "length": 8817, "nlines": 31, "source_domain": "saneguruji.net", "title": "साधना", "raw_content": "शनिवार, आँगस्ट 18, 2018\nआर्य हिंदुस्थानात आले तसेच युरोपियन अमेरिकेत गेले. तेथे जंगलांशी व रेड इंडियनांशी त्यांना झगडावे लागले. त्यांना निसर्गाशी व रेड इंडियनांशी स्नेहसंबंध कधी जोडता आला नाही आला; शेवटपर्यंत युध्दच करावे लागले. परंतु हिंदुस्थानात असे कृत्य लोकांची वसतिस्थाने आर्यांची तपोवने झाली. अमेरिकेत गेलेल्या युरोपियनांवर तेथील निसर्गाची ती हिरवी मंदिरे, तेथील विशाल नद्या गंभीर परिणाम करू शकली नाहीत. त्या जंगलांपासून नि नद्यांपासून त्यांना धन मिळाले, सत्ता मिळाली. कदाचित सौंदर्यवृत्तीचेही पोषण झाले असेल. एखाद्या कवीला स्फूर्ती मिळाली असेल. परंतु विश्व व मानव यांच्यांतील संगमतीर्थ होण्याचे महनीय पद तिकडील वनराजींना प्राप्त झाले नाही. ती भव्य कल्पना त्या लोकांच्या मनास शिवली नाही.\nअमेरिकेत जे परिणाम झाले त्याहून निराळे परिणाम झाले पाहिजे होते, असे नाही माझे म्हणणे. एकाच प्रकारचा इतिहास सर्वत्र घडेल तर मानवाने प्राप्त संधीचा दुरुपयोग केला असे म्हणावे लागेल. जगातील नाना लोकांनी नाना भिन्न भिन्न संस्कृतींचे संवर्धन मानवजातीच्या सेवेसाठी व वैभवासाठी करत राहिले पाहिजे. बाजारात विविध उपयोगी पदार्थ असतात, त्याप्रमाणे मानवी बाजारात विविध संस्कृती मांडण्यात यायला हव्यात. भिन्न भिन्न परिस्थितीतील लोकांना भिन्न भिन्न गरजा असतात. त्या महत्त्वाच्याही असतात. एकमेकांनी एकमेकांची न्यूनता आपल्याजवळचे देऊन दूर करायची. माझ्या म्हणण्याचा हेतू एवढाच की, आर्य लोक हिंदुस्थानात ज्या परिस्थितीत होते तिचा विशिष्ट उपयोग त्यांनी करून घेतला. त्या परिस्थितीतून त्यांनी महान् विचार मिळवले; ते आचरणात यावेत म्हणून थोर राष्ट्रीय प्रयत्नही केले. आपण आपल्या ध्येयाकडे जाण्यासाठी कमालीचा त्याग केला. अनंत कष्टांना कवटाळले. जीवनाच्या अथांग समुद्रात बुडी मारून आपण सत्यशोधन केले. ज्यांचा इतिहास आपल्यापेक्षा निराळा आहे त्यांनाही आपले आध्यात्मिक शोध उपयोगी पडतील. जीवन सर्वांगसुंदर करण्यासठी विविध जीवनतत्त्वांचे पोषण करणार्‍या विचारांची नेहमीच जरुरी असणार आणि म्हणूनच मानवी मनाचे खाद्य दशदिशांतून गोळा करून आणावे लागते.\nसंस्कृती म्हणजे त्या त्या राष्ट्राने आपल्या जनतेला विशिष्ट रीतीने वाढवण्यासाठी निर्माण केलेला साचा. प्रत्येक राष्ट्र त्याला जे उत्तमोत्तम वाटले तदनुसार सर्व स्त्री-पुरुषांचा विकास व्हावा म्हणून नीतिनियम करते. आचाराची, विचाराची एक विशिष्ट पध्दती निर्मिते. हे नीतिनियम, हे जीवनशास्त्र, हा साचा म्हणजेच संस्कृती. त्या त्या राष्ट्रातील सर्व संस्था, सत् व असत् याविषयीच्या तेथील कल्पना, तेथील स्मृती-सर्वांचा उपयोग त्या त्या संस्कृतीचा विशिष्ट छाप उठावा म्हणून होत असतो. आजची पाश्चिमात्य संस्कृती व्यक्तीची शारीरिक, बौध्दिक व नैतिक वाढ नीट व्हावी म्हणून व्यवस्थित संघटित प्रयत्न करत आहे. निसर्गावर मनुष्याची सत्ता अधिकाधिक प्रस्थापित व्हावी म्हणून राष्ट्रे आपापल्या सर्व शक्तींचा उपयोग करत आहेत. सृष्टीपासून जे जे मिळेल त्याचा नीट उपयोग करून घेण्यासाठी पाश्चिमात्य जिवापाड मेहनत करत आहेत. स्वतःच्या सिध्दीच्या आड येणार्‍या सर्व अडचणींचा धुव्वा उडवण्यासाठी संघटित प्रयत्न करत आहेत. सृष्टीशी वा अन्य राष्ट्रांशी नीट झगडे करता यावेत म्हणून स्वतःला शिस्त लावून घेत आहेत; प्रचंड सैन्य उभारीत आहेत; शस्त्रास्त्रे वाढत आहेत; यंत्रे, युक्त्या, शोध यांची सारखी वाढ होत आहे. त्यांच्या प्रचंड संघटना वेगाने पुढे जात आहेत. पाश्चिमात्यांचे हे कर्तृत्व आश्चर्यकारक आहे यात शंका नाही. मानवाच्या अमोघ अपार ऐश्वर्याचे हे अभूतपूर्व दर्शन आहे. सर्वत्र मानवाचे साम्राज्य पसरवण्याचे ध्येय त्यांना स्फूर्ती देत आहे.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://sanvaad.blogspot.com/2010/01/blog-post.html", "date_download": "2018-08-18T08:35:29Z", "digest": "sha1:TZWWCFQ7P4D5Z4AHJVNFP3OHTWFDDATC", "length": 34655, "nlines": 190, "source_domain": "sanvaad.blogspot.com", "title": "संवाद: कोकणसय", "raw_content": "\nमाझ्या मनातला सातत्याने चाललेला विचारांचा प्रवास...माझ्यातल्या चाकोरीबाहेरच्या नव्या जाणिवा, नव्या सृजनाची जाण...त्याची अभिव्यक्ति म्हणजेच हा संवाद...मर्मबंधातली ठेव ही\n२००९च्या वर्षांताला पुन्हा एकदा आजोळी जायचंच असं ठरवून, आणि नशीबाने त्यात काहीही अडथळे न येता, बर्‍याच वर्षांनी कोकणात पोहोचलो. गेल्यावर लगेच लक्षात आलं, की, अरे, कोकणही आता खूप बदललं.... बरचसं ओळखीचं खरं, पण थोडंसं अनोळखीही वाटायला लागलं.....\nदर उन्हाळी सुट्ट्यांमध्ये, कोकणात आजोळी - पणजोळी जायची चैन कधीचीच सरली आहे. मे महिन्यातल्या ऐन दुपारी, विहिरीकाठच्या आंब्यांच्या सावलीत बसून, जिवाला शांतवणारा वारा अनुभवत, गप्पांमध्ये रमण्याचे आणि गावाकडच्या मैत्रिणींनी सांगितलेल्या भुतांच्या \"लेटेश्ट\" कहाण्या आणि थोडयाफार - निरुपद्रवी का होईना - चहाडया ऐकून फिदफिदण्याचे आणि क्वचित प्रसंगी आश्चर्यचकित होण्याचे दिवससुद्धा कुठल्या कुठे उडून गेलेत...... बघता बघता, ज्या मायेच्या माणसांसाठी तिथे जात होतो, त्यांच्या कुशीत बसून आणि शेजारी झोपून कथा कहाण्या ऐकवत होतो आणि ऐकत होतो, हक्काने कौतुकं करुन घेत होतो, ती माणसंही राहिलेली नाहीत. गावी जायचं मुख्य प्रयोजनच सरलेलं आहे.....\nमला आठवतं तसं, माझ्या अगदी लहानपणी आजोळी वीजही पोहोचली नव्हती. जसजशी संध्याकाळ होऊ लागे, तसतसा अंधार हलके हलके अवघ्या आसमंतात पसरत जाई. बघता, बघता मिट्ट काळोखामध्ये सभोवताल हरवून जाई. आजी रोज सकाळी कंदीलांच्या काचा घासून पुसून स्वत: स्वच्छ करायची. संध्याकाळी ह्या कंदीलांच्या वाती ती उजळत असे. घराबाहेर काळोखाचं साम्राज्य पसरलेलं असलं तरीही, घरातला कंदीलांचा उजेड मोठा आश्वासक असायचा. त्या मंद, स्निग्ध प्रकाशात आम्ही सर्व पोरंटोरं शुभं करोति कल्याणम् म्हणत असू...पाठोपाठ, देवघरामध्ये अखंड तेवणार्‍या समयीची तेलवात ठीक आहे ना हे पाहून आणि मग तुळशीपुढे दिवा लावून, आजी सुस्पष्ट आणि हळूवार स्वरा -लयीमध्ये तिची नेहमीची स्तोत्रं म्हणायला सुरुवात करायची....संध्याकाळचं असं चित्र, तर सकाळी भल्या पहाटे उठून देवापुढं, वास्तुपुरुषाच्या गडग्यापुढं आणि पुढील दारी, तुळशीपुढं सडासंमार्जन आणि छोटीशीच का होईना, रांगोळी चितारायचा तिचा नेम कधीच चुकला नाही. देवघरातल्या देवीला आणि शाळीग्रामांना सोवळ्याचा नैवेद्य असे. घरासभोवताल असलेली कुंपणावर फुलणारी जास्वंद, चाफी, तुळशी, एखाद दुसरं गुलाबाचं फूल, काकडयाची फुलं, अबोलीचे, बकुळीचे वळेसर ह्यांनी फुलांची परडी भरायची. भटजी येऊन पूजा करुन जात.\nपिंगुळी येथील दत्त पादुका\nपूजेनंतर, चहा आणि रव्याचा लाडू खात, दोन चार सुख दु:खाच्या गप्पा करीत, आणि कुलाचार व्यवस्थित सुरु आहे, त्यामुळे देव देवता नेहमीच ह्या घराण्यावर प्रसन्न राहतील ह्याची ग्वाही देऊन संतुष्ट मनाने निघून जात. खरं तर पूजा सुरु असताना आम्हांला ती जवळून पहायची असे, पण, \"चला, चला दूर रवात आणि लांबून काय ती पूजा बघा समाजल्यात हात जोडल्यात काय की नुसतीच धुमशानां घालतल्यात\" असं मधून मधून सोवळेपणाचा अधिकार गाजवत, पूजा करता करता, मध्येच मंत्रपठण थांबवून भटजीबुवा आम्हांला दटावत\" असं मधून मधून सोवळेपणाचा अधिकार गाजवत, पूजा करता करता, मध्येच मंत्रपठण थांबवून भटजीबुवा आम्हांला दटावत मग, अश्या ह्या सोवळ्यातल्या भटजींना, बिन सोवळ्या व्यक्तीच्या हातचा चहा लाडू कसा काय चालतो, हा आम्हांला पडणारा प्रश्न असे, आणि त्यांच्या ह्या - आमच्या मते असलेल्या - डयांबिसपणावर, आतल्या सरपणाच्या, काळोखी खोलीत उभं राहून आम्ही खुसखुसत असू. वडिलधार्‍यांना असले प्रश्न विचारण्यात अर्थ नसे. अगोचरपणाबद्द्ल, कदाचित आम्हांलाच धपाटे पडण्याची शक्यता होती मग, अश्या ह्या सोवळ्यातल्या भटजींना, बिन सोवळ्या व्यक्तीच्या हातचा चहा लाडू कसा काय चालतो, हा आम्हांला पडणारा प्रश्न असे, आणि त्यांच्या ह्या - आमच्या मते असलेल्या - डयांबिसपणावर, आतल्या सरपणाच्या, काळोखी खोलीत उभं राहून आम्ही खुसखुसत असू. वडिलधार्‍यांना असले प्रश्न विचारण्यात अर्थ नसे. अगोचरपणाबद्द्ल, कदाचित आम्हांलाच धपाटे पडण्याची शक्यता होती तरीही एकदा आजीला मी हा प्रश्न विचारलाच होता..... मात्र पूजा करताना सोवळं ओवळं पाहणारे हेच भटजीबुवा मात्र जाताना आवर्जून \"शाळा शिकतंस मां नीट तरीही एकदा आजीला मी हा प्रश्न विचारलाच होता..... मात्र पूजा करताना सोवळं ओवळं पाहणारे हेच भटजीबुवा मात्र जाताना आवर्जून \"शाळा शिकतंस मां नीट आवशीक त्रास नाय मां दिणस आवशीक त्रास नाय मां दिणस खूप अभ्यास कर, बरां मोठ्ठा हो, हुशार हो, मोठा होवन आपल्या गावाक विसरां नको हां...समाजलय मां.. खूप अभ्यास कर, बरां मोठ्ठा हो, हुशार हो, मोठा होवन आपल्या गावाक विसरां नको हां...समाजलय मां.. \" असं मायाभरल्या आवाजात सांगून डोक्यावर मायेचा हात फिरवून जात.\nह्या वेळी देवघरात उभं राहून देव्हार्‍यात स्थानापन्न झालेल्या देवीला आणि शाळीग्रामांना हात जोडताना, पुन्हा एकदा हे सगळं आठवलंच. तेह्वा येणारे भटजीबुवा आता नाहीत, पण कोणी दुसरे भटजीबुवा येऊन पूजा करतात. त्यांचं फारसं, पूर्वीइतकं सोवळं नसावं बहुधा. तुळस मात्र अजूनही तशीच बहरते, सकाळच्या कोवळ्या उन्हांत तिच्या बाळमंजिर्‍या देखण्या दिसतात तुळशीवृंदावनाभोवती चितारलेल्या देवांना पूर्वीप्रमाणेच हात जोडले जातात आणि त्यांच्या पायांशी रसरशीत जास्वंदी वाहिल्या जातात. हे सारं पाहताना, एवढया छोटया गोष्टींसाठी काय भाबडं समाधान वाटून घ्यायचं, हे घोकतानाच, मनात नकळत समाधान रुजलंच. भाबडेपणा तर भाबडेपणा तुळशीवृंदावनाभोवती चितारलेल्या देवांना पूर्वीप्रमाणेच हात जोडले जातात आणि त्यांच्या पायांशी रसरशीत जास्वंदी वाहिल्या जातात. हे सारं पाहताना, एवढया छोटया गोष्टींसाठी काय भाबडं समाधान वाटून घ्यायचं, हे घोकतानाच, मनात नकळत समाधान रुजलंच. भाबडेपणा तर भाबडेपणा तो थोडाफार स्वभावात असण्याची चैन अजून परवडते, हेच नशीब\nसगळ्यांसारखंच शिक्षण, कॉलेज, नोकरी वगैरे शहरी जीवन मीही जगते, जे आता हाडीमांसी रुळून गेलं आहे. असं असलं ना, तरीही, मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी, जराही न बदललेलं असं, फक्त माझं स्वत:चं असं, कोकणच्या आठवणींनी पालवलेलं एक विश्व आहे. ते कधीही बदलत नाही, त्याला चरे जात नाहीत, ते फिकुटत नाही की विस्मरणात जात नाही. कधी ना कधी, ह्या ना त्या निमित्ताने ते मला सामोरं येतच राहतं. कोकण मनातून बाहेर पडायला तयार नाही ह्या वेळी, काही वर्षांनी पुन्हा कोकणात जाताना हे असं काहीबाही आठवत होतं....\nकोकणात शिरताना आंबोलीतून शिरायचं. निपाणीपर्यंत सरळसोट महामार्ग आहे. महामार्गावर जात असता, निपाणीपाशीच, एके ठिकाणी आजर्‍याकडे जायला रस्ता वळतो. तो रस्ता धरायचा. आतापर्य़ंतचा महामार्ग संपून हा छोटासा रस्ता सुरु होतो. मध्ये मध्ये रस्ता खराब आहे, पण जसंजसं आजरा मागे पडायला लागतं, तसतसं कोकणच्या खुणा दिसायला लागतात आणि एका वळणावर समोर येतो तो आंबोलीचा घाट आंबोली सदासुंदर ठिकाण आहे. कधीही जा, न कंटाळण्याची हमी\nपूर्वेचा वस इथून दिसणारी आंबोली\nआंबोली घाटात ’पूर्वेचा वस’ म्हणून एक देऊळ आहे, तिथेच देवळाशेजारी २-३ टपर्‍या आहेत, तिथला मस्त उकळलेला चहा आणि बटाटेवडे खाण्याचं भाग्य अजून तुम्हांला लाभलेलं नसेल, तर मी केवळ एवढंच म्हणू शकते, हाय कंबख्त, तूने... ह्याच टप्प्यावर जरा पुढे जाऊन थोडा वेळ उभं रहायचं आणि आंबोलीच्या दर्‍या डोंगरातून सुसाटणारा भन्नाट, वेगवान वारा अंगावर घ्यायचा ह्याच टप्प्यावर जरा पुढे जाऊन थोडा वेळ उभं रहायचं आणि आंबोलीच्या दर्‍या डोंगरातून सुसाटणारा भन्नाट, वेगवान वारा अंगावर घ्यायचा समोर दर्‍याखोर्‍यांडोंगरांचा आणि वनराजीचा एवढा विस्तीर्ण पसारा पसरलेला असतो... वळणावळणाची वाट पुढे पुढे जात असते.\nआंबोलीचं अ़जून एक दृश्य\nआपलं रांगडं, सभोवताल वेढून राहिलेलं देखणेपण आणि त्यापुढे आपला नगण्यपणा अतिशय सहजपणॆ निसर्ग एकाच वेळी आपल्या पदरात घालतो..... सलामीलाच असं चहू बाजूंनी कोकण तुम्हांला रोखठॊक सामोरं येतं, जसं आहे तसं. फुकाचा बडेजाव नाही, की उसनी आणलेली दिखाऊपणाची ऐट नाही. इथे जे काही आहे ते साधं, सहज आणि म्हणूनच सुंदर आहे. अगदी दगडी पाय़र्‍यांच्या खाचेमध्ये उमललेलं एखादं रानफूलसुद्धा\nआणि आंबोलीचा घाट उतरला की ह्या देवभूमीत प्रवेश होतो. आणि ही भूमीही अशी, की, सहज चित्त जाय तिथे, अवचित सौंदर्यठसा\nह्या भूमीचं स्वत:चं असं एक, अनेक घटकांनी बनलेलं अजब रसायन आहे. स्वत:चे कायदेकानून आहेत, अंगभूत अशी एक मस्ती आहे. इथल्या विश्वाला स्वत:ची अशी एक लय आहे, तंद्री आहे. इथला निसर्गही आखीव रेखीव नाही, त्याची रुपं ह्या भूमीवर यत्र, तत्र सर्वत्र उधळलेली आहेत. हे विश्वच वेगळं. इथले लाल मातीचे रस्ते, घरांच्या कुंपणांवरल्या जास्वंदी, माडां पोफळ्यांच्या बागा, आमराया, मागील दारी लावलेली, घरची आंब्या फणसांची झाडं, एखाद दुसरी सोनकेळ, तिच्या पानांमधून डोकावणारं सुरेखसं केळफूल, क्वचित बागेच्या एका कोपर्‍यातला निरफणस ह्यां सगळ्यांमधून डोकावणारी कौलारु घरं... सगळं कसं एखाद्या चित्रात शोभून दिसेल असं.\nसावंतवाडीच्या मोती तलावाचे वेगवेगळे मूड्स\nमोती तलावात कधीकाळी मोती सापडले होते म्हणे, म्हणून तलावाचं नाव मोती तलाव.\nकोकणात टिपलेली काही दृश्ये\nयादी इथे संपत मात्र नाही. इथले वाहणारे व्हाळ, पाणंद्या, शांत, सुंदर, साधीच असली तरी शुचिर्भूत वाटणारी देवालयं, दर्शनाला येणार्‍या प्रत्येकाच्या कथा व्यथा मनापासून ऐकणार्‍या आणि केलेल्या नवसांना पावणार्‍या नीटस सजलेल्या देवता, तरंग, देवळांसमोरच्या दीपमाळा, जिवंत झरे पोटात घेऊन कडक उन्हाळ्यातही नितळ पाण्याने झुळझुळणार्‍या आणि पंचक्रोशीची वा येणार्‍या जाणार्‍या कोणाही तहानलेल्याची तहान भागवणार्‍या बावी, तीमधे सुखाने नांदणारी कासवं आणि बेडूक, आणि त्यांच्या अवतीभोवती ओलसर वातावरणात उगवलेली नेची आणि मखमली शेवाळी, रस्त्यांच्या, शेतांच्या काठाकाठानं पसरत उमललेली लाजाळू, दोन गावांना जोडणारी मेटं, लहान मोठे धबधबे, कोणा भाग्यवंताच्या घरी असलेली गुरं, त्यांच्या गळ्यांतल्या लयीत वाजणार्‍या घंटा, ओवळीची झाडं, भातशेती, एखाद्या टिकलीएवढ्या छोट्याश्या गावातलं कमळांनी फुललेलं तळं, काजूंच्या झाडांचे कोवळे लसलसते सोनेरी कोंब, रायवळांचे आणि हापूस पायर्‍यांचे गंध, फणस गर्‍यांचे दरवळ, रानमेवा.... काय आणि किती... लहानपणापासून जरी हे सगळं पाहिलेलं असलं तरी अजूनही ह्या वातावरणाची मोहिनी माझ्या मनावरुन उतरायला तयार नाही. इथल्या भुतांखेतांच्या गप्पांसकट हे सगळं माझ्या मनात कायमचं वस्तीला आलेलं आहे.\nवालावलच्या लक्ष्मीनारायण मंदिराशेजारचं निळंशार तळं\nपाट - परुळेपैकी पाट गावात असलेलं भगवती मंदिराशेजारचं कमळांनी भरलेलं तळं\nआणि कोकणातल्या समुद्रकिनार्‍यांबाबत तर किती सांगायचं तिथल्या निर्मनुष्य किनार्‍यांवरुन, मऊ रेतीत पावलं रोवत फिरायचं असतं, छोटे खेकडे वाळूवर तिरप्या रेषा काढत धावताना बघायचं, किनार्‍यालगतच्या माडांची सळसळ अनुभवयाची आणि समुद्राची गाज ऐकताना ’या हो दर्याचा दरारा मोठा’ हेही जाणून घ्यायचं... शांत वातावरणात, त्याच वातावरणाचा भाग होऊन कायमचं, निदान काही तास तरी निवांतपणे बसून रहायचा मोह होतो. हळूहळू समुद्र आपला जीव शांतवून, सुखावून टाकतो. काही वेळासाठी का होईना, सगळ्या चिंता, विवंचना विसरुन जायला होतं. पाठीमागे माडाचं बन, समोर अथांग समुद्र आणि माथ्यावर निळं आभाळ. एखादी होडी हे चित्र अधिक सुंदर बनवेल वाटेपर्य़ंत तीही नजरेला पडते तिथल्या निर्मनुष्य किनार्‍यांवरुन, मऊ रेतीत पावलं रोवत फिरायचं असतं, छोटे खेकडे वाळूवर तिरप्या रेषा काढत धावताना बघायचं, किनार्‍यालगतच्या माडांची सळसळ अनुभवयाची आणि समुद्राची गाज ऐकताना ’या हो दर्याचा दरारा मोठा’ हेही जाणून घ्यायचं... शांत वातावरणात, त्याच वातावरणाचा भाग होऊन कायमचं, निदान काही तास तरी निवांतपणे बसून रहायचा मोह होतो. हळूहळू समुद्र आपला जीव शांतवून, सुखावून टाकतो. काही वेळासाठी का होईना, सगळ्या चिंता, विवंचना विसरुन जायला होतं. पाठीमागे माडाचं बन, समोर अथांग समुद्र आणि माथ्यावर निळं आभाळ. एखादी होडी हे चित्र अधिक सुंदर बनवेल वाटेपर्य़ंत तीही नजरेला पडते दर्या त्यादिवशी माझ्यावर बहुधा एकदम मेहेरबान असतो दर्या त्यादिवशी माझ्यावर बहुधा एकदम मेहेरबान असतो\nनिळी निळी सुरेल लाट, रत्नचूर सांडतो, फुटून फेस मोकळा नवीन साज मांडतो.....\nलांबून दिसणारा भोगवेचा सागरनजारा\nअशी ही देवभूमी. इथे पावलांपावलांवर सौंदर्य आहे, वातावरणात जिवंतपणा आहे आणि ह्या सर्वांपेक्षाही लोभस, जिवंत आहेत ती इथली माणसं. बर्‍या वा वाईट, अनुकूल असो की प्रतिकूल असो, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं माणूसपण न सोडता जगणारी, जिभेवर काटे असले तरी पोटात मात्र निव्वळ माया असलेली माणसं. मायेच्या आतल्या उमाळ्याची आणि फक्त ओठांतूनच नाही, तर डोळ्यांतूनही मनापासून हसणारी, आणि तसंच आपले राग लोभही ठामपणे बोलून दाखवणारी माणसं. त्यांच्यापाशी शून्यातून जग निर्माण करण्याची जिद्द आहे. कष्टांना भिऊन एखाद्या कामापासून मागं सरणं त्यांना ठाऊक नाही, आणि दिलेला शब्द पाळण्याची त्यांच्यात दानत आहे. वेळी अवेळी दारात आलेल्या अतिथीचंही इथे मनापासून स्वागत होतं आणि पाहुण्यासारखं घरादारानं वागावं ही अपेक्षा न ठेवता, घरादारासारखं, त्यांच्यापैकीच एक बनून वागलात, तर कोकणातलं घर तुम्हांला कायमचं आपलसं करुन घेतं कोणाची आर्थिक पत किंवा मोठेपणा ह्यांनी भारावून वा बुजून जाऊन किंवा त्या बाबींच्या अनुषंगाने आपल्याला ह्या व्यक्तीकडून किती फायदा होऊ शकतो, असा हिशेबी विचार करुन तोंडदेखलं का होईना पण आदरार्थी वगैरे वागायची इथे पद्धतच नाही. बाहेरच्या जगात असणारा एखादा शेठ वगैरे, त्याच्या गावात, शेजारी पाजारी आणि पंचक्रोशीत प्रथमपुरुषी एकवचनी संबोधनानेच ओळखला जातो, अन त्यालाही त्यात काही वावगं वाटत नाही. इथलं कष्टमय आयुष्य हसतमुखानं उपसताना, परिस्थितीच्या शाळेत, अनेक अडचणींचा सामना करत इथल्या जुन्या पिढ्यांनी आयुष्यविषयक आडाखे, मतं स्वत: तयार केलेली आहेत आणि अनुभवांतून शहाणपण शिकलेलं आहे. भलेही त्यांच्याकडे उच्च शिक्षण नसेल - बर्‍याचजणांनी तर शाळेनंतर महाविद्यालयाची पायरीही चढलेली नसेल, पण त्यांचं शहाणपण कोणाहूनही कमी नाही.\nहिरवे हिरवे गार गालिचे\nकोकणची माणसं साधीभोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी\nआता नवी पिढी बाहेरच्या जगातले बदल पाहून त्यानुसार बदलते आहे आणि आपापल्या गावांमध्येही सुबत्ता आणू पहाते आहे, जागरुक बनते आहे, शिकते आहे, त्याचंही कौतुकच वाटत. एके काळी बहुतांशी अठरा विश्वे दारिद्र्य नांदणार्‍या ह्या कोकणात आता बर्‍यापैकी सुबत्ता नांदताना दिसते. कोकणातलं दारिद्र्य असंच दूर होत रहावं, तिथे चारी ठाव सुबत्ता नांदावी, मात्र, ह्या कोकण प्रांताची कोकणी ओळख मात्र अजिबात हरवू नये ही इच्छा मनात धरून देवघरातल्या देवाला हात जोडत त्याचा आणि आजोळचा निरोप घेतला.\nमावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले...\nवेळ थोडा राहिलेला, सूर सारे संपले, या असीमाला तरीही पाहिजे ना मापले\nवाहत्या पाण्यातूनी गुंफीत जावे साखळी, एक नाते मी तसे शोधीत आहे आपले\nनिघायच्या आदल्या दिवशी लाडक्या तळ्यावर जाऊन खूप वेळ बसले. लहानपणी खेळायचो तो पाण्यात चपट्या टिकर्‍या फेकण्य़ाचा खेळ मनसोक्त खेळून घेतला. बाजूला तीन, चार छोटी मुलं आपलं हसू लपवत कुजबुजत होती, त्यांनाही खेळात सामील करुन घेतलं आणि मग एकदमच धमाल आली खेळायला सूर्यास्त झाला, रात्र होत आली, तसं शेवटी तळ्यावरुन उठून घरची वाट पकडली. आठवड्याची सुट्टी संपल्याचं प्रकर्षाने जाणवलं....\nदुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा एकदा शहराकडे गाडी दामटली.\nसुंदर... फोटो तर लय भारी...\nपंख असायला हवे होते.\nयशो,कोकणचा साधेपणा नुसता फोटोतच नाही तर तुझ्या शैलीतही उतरलाय. खूप मस्त\nबरेच दिवस इथे आले नव्हते, लेख व फोटो आवडले हे सांगितल्याबद्दल सार्‍यांचे खूप आभार\n@ a Sane man - शांता शेळके, आणि तुमचा ब्लॉग आता केवळ निमंत्रितांसाठी का\nमाझिया मना जरा सांग ना\nप्रतिबिंब - आणि हा ब्लॉग बघणीय पण :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://swarnim-sakhi.blogspot.com/2011/07/blog-post_4703.html", "date_download": "2018-08-18T08:17:45Z", "digest": "sha1:DSO6YNCCYWO6JSVU3OOOLQETIJTSHRAL", "length": 9829, "nlines": 141, "source_domain": "swarnim-sakhi.blogspot.com", "title": "Swarnim Sakhi...: पाऊस ...", "raw_content": "\nअस्सा भरारा वारा सुटतो अन् सारा आसमंत वादळून जातो ..\nआपण वेड लागल्या गत पाहत राहतो...\nपाऊस ... वेडा पाऊस...\nचिंब करणारा.. स्वप्ने जागवणारा...\nवाट पाहायला लावणारा... अन् न चुकवता “प्रिय”च्या आठवणी घेऊन येणारा...\nदुरून आकाशवाट चालून येतो अन् भिजवतो...\nअन् आपण भिजत राहतो..\nधारांमधे ... आठवणीच्या गारांमधे ...\nकसे सांगणार... कसे उत्तर देणार ...\nअसे हे आठवणींचे आवर्त सुरू होते.. सार्‍या भावनांचा कल्लोळ ..\nअन् ते शमवायची ताकद सुद्धा त्या पावसाकडे..\nकिती वाट पाहावी.. किती झेलावे ... किती भिजावे…अंतर्बाह्य …\nकुणी धाडिले हे घनु जांभळे\nकुणी वेढिले हे ऋतू कोवळे\nनभातून वाहे व्यथा मुक्त हळवी\nडोळ्यातूनी अन् हसू साकळे \n\"तू न मी\" हातात हात घेऊन तळव्यावर पाऊस झेलताना\nठाऊक असतील त्याला.. कोसळणार्‍या सार्‍या रात्री..\nपापण्यांवर आणून परतवलेला सारा पाऊस..\nबरसलेल्या सार्‍या आठव सरी\nपण या वेळी मात्र पाऊस तुझा न माझा असणार न...\nतुला स्पर्श करून माझ्याकडे येईल तो... चिंब करायला..\nतुझे श्वास घेऊन येईल.. मृदगंध होऊन भारायला..\nअन् तू होऊनच बरसेल.... अंतर्बाह्य …\nLabels: पाऊस, वर्षा, श्रावण\nबहारदार पाऊस बरसू दे...\n अन इथे सख्य असेल ते जे जे उत्तम उदात्त सुंदर अश्या सारया हृद्य गोष्टींचे .. कविता... लेख... पुस्तक.. फोटो .. रंग ... रेषा... उकार ..वेलांट्या.. जगण्यातल्या चिमुकल्या क्षणांचे .. मनस्वी नात्यांच्या इंद्रधनुषी गोफांचे.. लडीवाळपणे भवती भवती फेर धरणारया आठवणींचे ... अन अंतरी कस्तुरी सारख्या दरवळणारया मैत्रीचे ... किंवा अगदी पायी टोचणारया काट्याचे .. नि पदर ओढत ओरखडे देणाऱ्या निवडुंगाचे सुद्धा .. या सारया गोष्टींचे सख्य आहे.. म्हणून सखी आहे ...\nसांगता येत नाही ...\nरोज की तरह आ गयी वो... रोज की तरह बच्चा देखता रहा अपनी भूरी आँखे भरके... हाथ उठाये ... दिल भरमाये ... रोज की तरह ... फिर एक बार आस लगा...\nपावसात भिजलेले तन मन माझे उगीचच रुसण्याचे बहाणे हे तुझे क्षणार्धात विरतील दुराव्याचे ढग एकदाच परतुनी माझ्याकडे बघ ... ...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ७\nदिवस सातवा हाही दिवस असाच पहाटे उठतो... आधी गणपतीची रूप डोळ्यात रेखून... मग बाकी काम चालू करतो.. सकाळीच पूजा, आरती करून शेजारया...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग 5\nदिवस पाचवा.. हा दिवस गाजवत येतो तयारी हरतालिकेची अन गणपतीची .. सुरु होतो तोच वाजत गाजत .. पुन्हा एकदा वारी बाजाराची... तयारी हरतालिकेच...\nA Walk In Cloud.... गत वर्षीची कोजागिरी अशी जगजीत सिंगजींच्या गझलेत चिंब भिजलेली होती... \"हाथ छुटे भी तो रिश्ते नाही तोडा करते\" ...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ३\nदिवस तिसरा हा दिवस शुभ्र सकाळचा... किलबिल पक्ष्यांच्या आवाजाने जागा होणारा... शेजारच्या गोठ्यातल्या गाईच्या घुंगुरवाळा आवाजाचा... ...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ४\nदिवस चौथा हा दिवस तसा आरामाचा... सुशेगात उठण्याचा... कामाची घाई विसरून चहा पार्टी करण्याचा.. तळ्याच्या काठावर बसून शांत...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ६\nदिवस सहावा... अन मग हा उत्सवी दिवस उजाडतो भल्या पहाटेच... मूर्ती स्थानापन्न होते सजवलेल्या माटीच्या मखरात...मागे रंगवलेले चित्र आत...\nपदर ... नक्षीदार पदर ... रेशमी साडीचा...बुट्टीदार काठाचा .. जरतारीच्या मोराचा वयात येताना आपसूकच चापून-चोपून खांद्यावर विसावलेला... सौभ...\nहृद्य वाचकगण - Followers\nकविता (27) तुमचे सुद्धा होते का असेच (14) सखी (10) मैं (9) भक्ती (3) गोकुळ (2) होकार (2) निळा शाम (1) निळाई (1) भूल (1)\nशेअर विथ केअर :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=436&Itemid=626&limitstart=4", "date_download": "2018-08-18T08:13:02Z", "digest": "sha1:MU4OJXLZ2EZDWWJAFNQ73O5YS3HTVT3X", "length": 8392, "nlines": 37, "source_domain": "saneguruji.net", "title": "साधना", "raw_content": "शनिवार, आँगस्ट 18, 2018\nप्राचीन आर्यावर्तातील संपूर्णतेचे ध्येय याहून निराळे होते. पाश्चिमात्य आपल्या ध्येयासाठी जशी अहोरात्र धडपड करतात, तशीच प्राचीन भारतीयांनीही स्वतःच्या ध्येयासाठी केली. भारतीय संस्कृतीने सत्ता व सामर्थ्य यांना परमोच्च ध्येय म्हणून कधीच पूजले नाही. हिंदी जनतेचे रक्षण वा भक्षण करण्यासाठी म्हणून सर्वांनाच कधी शिपाई बनवले नाही. साम्राज्ये, लष्करी प्रभुत्व यासाठी हा देश फारसा कधी हपापला नव्हता; आणि म्हणूनच युरोपात यासाठी जशा संघटना दिसतात तशा आपल्याकडे दिसत नाहीत. भारतवर्षातील ध्येयासाठी उत्तमोत्तम माणसांना एकान्तमय जीवन कंठावे लागे. ध्यान, चिंतन यात त्यांना तन्मय व्हावे लागे. आपल्या पूर्वजांनी जे सत्यशोधन केले, मानवजातीला जे बहुमोल ठेवे दिले, त्यासाठी त्यांना ऐहिक वैभव, ऐहिक सुखविलास दूर सारावे लागत. त्यांना अपार व्यावहारिक नुकसानही सोसावे लागले. परंतु असे असले तरी भारतीयांचेही कार्य अपूर्व व लोकोत्तर आहे, भव्य व दिव्य आहे, यात शंका नाही. हे कार्य म्हणजे मानवी हृदयात अनंताला मिठी मारण्याची जी अनिवार्य तृषा असते तिचेच बाह्य आविष्करण होते. जीवनात अनंताचा साक्षात्कार करून घेतल्याशिवाय खरी विश्रांती नाही-हे ते ध्येय होते.\nभारतात सद्गुणी, शहाणे व शूर पुरुष झाले. येथे राजनीतिज्ञ, मुत्सद्दी, सम्राट, चक्रवर्ती झाले. परंतु येथे आदर्श पुरुष कोणाला मानण्यात आले ऋषी हा आमचा आदर्श होता. आणि ऋषी म्हणजे काय\nसंप्राप्यैनं ऋषयो ज्ञानतृप्ताः ॥\nते सर्वगं सर्वतः प्राप्य धीराः\nयुक्तात्मानः सर्वमेवाविशन्ति ॥ (मुंडकोपनिषद्)\n“परमात्म्याला मिळवून ज्ञानाने तृप्त झालेले, आत्म्याचे परमात्म्याशी ऐक्य अनुभवल्यामुळे कृतार्थ झालेले, सर्व स्वार्थापासून मुक्त, जगाच्या सर्व प्रवृत्तींत प्रभुदर्शनच होत असल्यामुळे शांत राहणारे विश्वव्यापी प्रभूला सर्वत्र प्राप्त करून घेत असल्यामुळे जे धीरंगंभीर असतात व विश्वजीवनाशी समरस होतात, ते ऋषी” अशी ही व्याख्या आहे.\nया श्लोकात वर्णिल्याप्रमाणे विश्वाशी आपला संबंध अनुभवणे, प्रभूशी एकरूप होऊन तदद्वारा चराचराशी अद्वैत जोडणे, हे या देशात मानवाचे अंतिम ध्येय मानण्यात आले होते. हे ध्येय प्राप्त करून घेण्यात मानवी कृतार्थता आहे, असे समजण्यात येई.\nमनुष्य जाळपोळ करू शकतो, लुटालूट, कत्तली करू शकतो, व्यापार करू शकतो, कुबेर होऊ शकतो, अज्ञानाचा शोध लावू शकतो, कलानिर्मिती करू शकतो; परंतु यांतील कोणत्याही गोष्टीमुळे त्याचा खरा मोठेपणा सिध्द होत नाही. आपल्या आत्म्यात तो चराचराचा समावेश करू शकतो म्हणून तो मोठा. ज्या वेळेस मानवी आत्मा, शुष्क, निस्सार अशा रुढीत गुरफटून जातो, क्षुद्र कामातच मग्न होतो, तेव्हा त्याला अनंत क्षितिज मग दिसत नाही. मनुष्याचे खरे स्वरूप म्हणजे विश्वव्यापी होणे, सर्वांशी मिळून जाणे हे आहे. मनुष्य स्वतःचा वा सृष्टीचा दास नाही. तो मुळात प्रेम करणारा आहे. मनुष्याची मुक्ती व पूर्णता प्रेमात आहे. प्रेम म्हणजे काय पूर्णपणे एकरूप होणे म्हणजे प्रेम. या सर्व विश्वाशी एकरूप होण्याची जी शक्ती तिच्यामुळे जीव शिव बनतो. आत्म्याचे हे खरे स्वरूप. ज्या वेळी मनुष्य इतरांना कोपरखळ्या देऊन दूर लोटून स्वतःची प्रौढी मिरवू पाहतो, जेव्हा त्याचा गर्व वाढतो, त्या वेळेस तो परमात्म्यापासून दूर जातो. मानवी जीवनाचे ध्येय ज्यांनी गाठले त्यांचे उपनिषदात प्रशान्त व युक्तात्म असे वर्णन आहे. सृष्टीशी व मानवाशी ते प्रेमाने वागतात आणि म्हणून परमात्म्याशी जोडले जाऊन ते परम शान्ती अनुभवतात.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-08-18T09:05:48Z", "digest": "sha1:YOM4S2JGLXT42SOBMA7NP3G4UMLTM2YD", "length": 6980, "nlines": 63, "source_domain": "m4marathi.com", "title": "चारित्र्य | m4marathi", "raw_content": "\n‘चारित्र्य’ हि प्रत्येक माणसाची ओळख असते आणि असलीच पाहिजे. आपण कसे वागतो, बोलतो, आपला कौटुंबिक-सामाजिक व्यवहार कसा आहे, आपले आर्थिक व्यवहार कसे आहेत यावरून आपले चारित्र्य कसे आहे याचा अंदाज इतरांना येत असतो. आपण स्वतःकडे जेवढे लक्ष देतो त्याहूनही अधिक इतर लोक आपल्याकडे लक्ष देत असतात. फरक एवढाच असतो कि आपण स्वतःची काळजी घेण्यासाठी स्वतःकडे लक्ष देतो, तर इतर लोक आपले परीक्षण करतात.\nएखादे व्यसन करणे वा मद्यपान करणे हा ज्याचा त्याचा व्याक्रिगत प्रश्न. आजकाल तर एखादेतरी व्यसन असणे हा बहुदा आजचा ट्रेंडच बनला आहे. त्याकरीता आपण काय व्यसन करतो, कुठे करतो याचेही संकेत डावलले जातात. यामुळे आपल्या चारित्र्याविषयी इतरांचे वाईट मत बनते याचाही त्यांना विसर पडतो. ‘कुणी बघतोय तर बघू देणा आपल्याला काय त्याचे’ असे म्हणून सोयीस्करपणे कानाडोळा केला जातो. मात्र, ह्या गोष्टी नंतर आपल्याच अंगलट येतात.\nकुठलीही व्यक्ती हि कुटुंबवत्सल असायला हवी. आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आवडी-निवडी, त्यांच्या गरजा, दुखणे-खुपणे यावर लक्ष असायला हवे. महत्वाचे सण-समारंभ, काही महत्वाच्या प्रसंगावेळी आपण आपल्या कुटुंबासमवेत असायला हवे. एखाद्या अडचणीच्या प्रसंगात कुटुंबाच्या मागे भक्कमपणे उभे राहायला हवे.त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपणेही महत्वाचे आहे. समाजातील सुख-दुःखात सहभागी व्हावे, सार्वजनिक उपक्रमात सहभागी व्हावे, शक्य असल्यास आर्थिक मदत करावीही.\nआपले आर्थिक व्यवहारही चोख असायला हवे. आपण कुणाचे देणे लागत असल्यास ते वेळचेवेळी परत करावेत. उशीर होणार असल्यास संबंधिताकडून तशी वेळ मागून घ्यावी. काही लोकांना कुणाचे पैसे द्यावयाचे असेल आणि सध्या त्यांच्याकडे द्यायला पैसे नसतील तर संबंधितांना तसे न कळविता ते त्यांना भेटनेही टाळतात. त्यांचा फोन येईल म्हणून फोन बंद करून ठेवतात किंवा फोन उचलणेही टाळतात. यामुळे आपल्या चारित्र्याविषयी शंका उत्पन्न होते. बहुतकरून आपल्या चारित्र्याविषयी चांगले वा वाईट मत आपल्या आर्थिक व्यवहारांवरूनच बनत असते.\nचांगले चारित्र्य हा प्रत्येकाचा एक महत्वाचा दागिना आहे. ते जपणे आपल्याच हातात आहे. त्याला तडा जाईल असे कुठलेही कृत्य आपल्या हातून घडणार नाही याची सतत काळजी घेतली पाहिजे\nIPL हंगामाला आजपासुन सुरुवात\nलग्नमंडपातून वधूचे पलायन…..मन उध्वस्त करणारा प्रसंग….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=436&Itemid=626&limitstart=6", "date_download": "2018-08-18T08:13:18Z", "digest": "sha1:ZSNS2Z6U44FYJAGVTWBQHPHZ4SSKJ2V2", "length": 5627, "nlines": 38, "source_domain": "saneguruji.net", "title": "साधना", "raw_content": "शनिवार, आँगस्ट 18, 2018\nअसे ब्रह्माचे वर्णन आहे. ब्रह्म म्हणजे जीवनाचे जीवन, सर्वांना प्रकाश देणारे तत्त्व. ते बाहेरच भरून राहिले आहे असे नाही, तर ते आपल्यामध्येही आहे. “यश्चायमात्मनि” - जे तुझ्या आत्म्यातही आहे. एकच चैतन्य आत बाहेर सर्वत्र आहे.\nविश्वाशी एकरूप होण्यासाठी आपली भावना अनंत भावनेशी एकरूप केली पाहिजे. आपल्या भावनांचे क्षेत्र वाढवणे यातच मानवाची खरी प्रगती. ज्या मानाने तुमची भावना विशाल, त्या मानाने तुमची उन्नती. मानवी भावना अधिकाधिक विशाल व्हावी म्हणून काव्ये, तत्त्वज्ञाने, कला, शास्त्रे, धर्म यांचे सतत प्रयत्न. तुमची इस्टेट किती, यावरून तुमच्या जीवनाला किंमत नसून, तुमचही सहानुभूती किती व्यापक, यावर ती अवलंबून आहे. आपली जाणीव मुक्त करण्यासाठी, विशाल करण्यासाठी, किंमत द्यायला हवी. स्वार्थाचा होम ही ती किंमत. आत्मज्ञान हवे असेल तर देहार्पण करा. त्यागानेच वैभव. मरणानेच जीवन. उपनिषद् सांगते : ‘त्यागाने मिळेल. अधाशी नको होऊ.”\nगीतेचेही हेच सार. निरपेक्ष कर्तव्य कर,-गीता सांगते. “कर्मफलत्याग सांगण्याच्या मुळाशी संसार मिथ्या ही भावना आहे,” असा निष्कर्ष काही पाश्चिमात्य पंडित काढतात. परंतु गोष्ट खरोखर उलट आहे. जो मनुष्य स्वार्थी असतो, त्यालाच इतर सारे तुच्छ वाटतात. त्याला स्वतःच्या मानाने इतर जग जणू मिथ्या वाटते. सारे जग सत्य आहे, असे अनुभवायचे तर वैयक्तिक वासना, स्वार्थ, यांना सोडावेच लागेल. आपली सामाजिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी, इतरांच्या सुखदुःखात समरस होण्यासाठी आपणांस हा संयम शिकणे प्राप्त आहे. अधिक उदात्त जीवन मिळवायचे म्हणजे अधिक त्याग करावयाचा. ऐक्यभावना वाढत विश्वैक्य अनुभवणे हे मानवजातीचे ध्येय आहे.\nभारतीय ब्रह्माची कल्पना पोकळ, शून्य नाही. ऋषी असंदिग्धपणे म्हणतो :\nइह चेत् अवेदीत् अथ सत्यमसि\nन चेत् इह अवेदीत् न हती विनष्टिः\nया जीवनात ते जाणून घेणे म्हणजेच खरोखर जगणे; ते न जाणून घेणे म्हणजे मोठी हानी. अशा त्या ब्रह्माला कसे जाणावे ‘भुतेषु भूतेषु विचिन्त्य’ - सृष्टीत सर्वत्र त्याला पाहून. कुटुंब, समाज, राष्ट्र, विश्व-अशा रीतीने ऐक्यबुध्दीचे क्षेत्र उत्तरोत्तर वाढवण्यातच आपले कल्याण आहे. या गोष्टीपासून पराङ्मुख होणे म्हणजे नाशाकडे जाणे होय.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=436&Itemid=626&limitstart=7", "date_download": "2018-08-18T08:13:25Z", "digest": "sha1:PGOJEJNCXHDJMBKVTTZGCDAWNFR2SQY3", "length": 5933, "nlines": 31, "source_domain": "saneguruji.net", "title": "साधना", "raw_content": "शनिवार, आँगस्ट 18, 2018\nभारतातील निरभ्र आणि विशाल गगनमंडपाखाली बसून प्राचीन ऋषी विश्वैक्याचा संदेश देत आहेत, असे ते दृश्य मनासमोर येऊन मानवजातीच्या उज्ज्वल भवितव्याविषयी माझे मन आशेने नि आनंदाने फुलते. ‘विश्वैक्य अनुभवा’ असे सांगणारे ऋषी व्यर्थ बडबड नव्हते करत. आपण माकडाचे वंशज, पशूतूनच उत्क्रान्त होत आलो, अशी ती बहिर्दृष्टी. बडबड नव्हती. कल्पनेने आपले प्रतिबिंब सर्वत्र पाहण्याची ती अतिशयोक्ती नव्हती. सृष्टीच्या रंगभूमीवरील छाया-प्रकाशांत क्षणभर बघायचे ते नाटक नव्हते; तर क्षुद्र बंधने तोडून ते विश्वात्म्याशी प्रत्यक्षतः एकरूप होणे होते. तो कल्पनेचा विलास नव्हता, बुध्दीची कसरत नव्हती. स्वतःच्या स्वार्थापासून विचाराची ती स्वतंत्रता होती. जी शक्ती बाहेर निसर्गात हजारो रुपांनी कर्म करत आहे, तीच जाणीवरूपाने आपणामध्येही आहे, याचा तो गंभीर अनुभव होता. सृष्टीत सर्वत्र भरून राहिलेल्या ऐक्याची ती प्रचीती होती. त्यांना खंड कोठे दिसत ना. अखंड आत्मतत्त्व सर्वत्र भरलेले. सत्याच्या प्रान्तात मृत्यूमुळे खंड पडत नव्हते. कारण ते मृत्यूसही मानीत नव्हते. मृत्यू म्हणजे तरी काय\nजीवन म्हणजे मृत्यू, आणि मृत्यू म्हणजे जीवन. जीवन व मरण जणू समानार्थक शब्द. दृश्य जीवन व अदृश्य जीवन; दोहोचा सारख्याच आनंदाने ऋषींनी स्वीकार केला. “नमोऽस्तु आयते, नमोऽस्तु परायते”- जवळ असल्यास नमस्कार, दूर गेलेल्यास नमस्कार. जन्ममरणाच्या वर लाटा उसळतात. खाली अथांग जीवन आहे. अतूट जीवन. “यदिदं किं च प्राण एजति निःसृतम्”- सारे काही जे आहे ते त्या अमर जीवनातूनच उसळत बाहेर आले आहे. जीवन विशाल आहे- “प्राणो विराट् \nअसा हा आपला थोर वारसा आहे. ही संपत्ती, हा वारसा आपली वाट पाहात आहे. चला, ही ठेव आपण आपलीशी करू. आपला विचार विश्वव्यापी करणे हे ध्येय ऋषींनी दिले आहे; ते आपलेसे करा. हे ध्येय म्हणजे बुध्दिवाद नव्हे. कल्पनेचे केवळ हे तारे नव्हते. याला नैतिक पाया आहे. हे ध्येय कृतीत आणायचे आहे. उपनिषद् म्हणते : ‘सर्वव्यापी स भगवान् तस्मात् सर्वगतशिवः ’-तो परमात्मा सर्वव्यापी आहे. सर्व वस्तूंतील चांगुलपणा म्हणजे तो. सर्व प्राणिमात्रांशी मनाने, बुध्दीने, प्रत्यक्ष सेवाकर्माने एकरूप होणे, सर्वांवर प्रेम करणे, परमात्म्यात स्वतःला मिसळणे, त्याच्यामध्ये आपण आहोत याचा अनुभव घेणे म्हणजे खरे मंगल, म्हणजे परम कल्याण, हे उपनिषदाचे सार. “प्राणी विराट्”- जीवन विशाल आहे, अनंत आहे, याचा अनुभव घ्या.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://sanvaad.blogspot.com/2007/12/blog-post_16.html", "date_download": "2018-08-18T08:35:58Z", "digest": "sha1:2XI27SXLPJKXH2NAECO3DSJ3GILZ7PAO", "length": 10260, "nlines": 145, "source_domain": "sanvaad.blogspot.com", "title": "संवाद: सुमल्याची आश्रम वारी!!... (३)", "raw_content": "\nमाझ्या मनातला सातत्याने चाललेला विचारांचा प्रवास...माझ्यातल्या चाकोरीबाहेरच्या नव्या जाणिवा, नव्या सृजनाची जाण...त्याची अभिव्यक्ति म्हणजेच हा संवाद...मर्मबंधातली ठेव ही\n\"रे, माका काय न चलूक पण सुमल्याक पण विचारुक व्हया मां पण सुमल्याक पण विचारुक व्हया मां तेणी हो म्हणूक व्हया मां तेणी हो म्हणूक व्हया मां आयला तर बराच होईत, आमका ही काळजी नाय होईत, आणि पोरग्या आसाही चुणचुणीत, काय हो मास्तर, तुमका काय वाटता आयला तर बराच होईत, आमका ही काळजी नाय होईत, आणि पोरग्या आसाही चुणचुणीत, काय हो मास्तर, तुमका काय वाटता\n\"माझ अनुमोदन आहे हो हुशारच ती, पण शिकली नाही हुशारच ती, पण शिकली नाही नाहीतर आज गावाचे नाव काढले असते हो पोरीनं नाहीतर आज गावाचे नाव काढले असते हो पोरीनं हंऽऽऽ कमी का समजावले मी तीस आणि तिच्या आईस आणि बापूसाक पण नाहीं कोणी फारसे मनावरच नाही घेतले असो. रे बाबल, येऊ दे हो सुमतीला आमच्या सोबत. भारी तीक्ष्ण नजरेची पोर आहे होऽऽऽ आणि तुझ्या काकीबायची आवडती पण. बायका बायका घालतील घोळ एकत्र, आमच्या डोक्यांस शांतता असो. रे बाबल, येऊ दे हो सुमतीला आमच्या सोबत. भारी तीक्ष्ण नजरेची पोर आहे होऽऽऽ आणि तुझ्या काकीबायची आवडती पण. बायका बायका घालतील घोळ एकत्र, आमच्या डोक्यांस शांतता कसें\nआणि अश्या रीतीन ठरला, काका, मास्तर आणि दोघांचे फ़्यामिल्ये, गुरव आणि सुमल्या, येवढे मंडळी जावन आश्रम बघून येतली.\nसुमल्याक बातमी देवक बाबल सुमल्याक हाकारतच तेच्या घरच्या ओसरीर येऊन ठेपलो.\n चल, हिकडे ये बघया चटचट गो सुमल्या अगो, चल लवकर, माका कामा आसात गोऽऽऽ काय फक्त तुझ्या पाठसून बातमे देवक धावत रवतलय काय दिसभर काय फक्त तुझ्या पाठसून बातमे देवक धावत रवतलय काय दिसभर चल, चल\n\"रे, काय झाला, मेल्या वराडतस कित्या धोतराक आग लागल्या सारखो काऽऽऽय, काय झाला\n\"गो, सामान बांधूक घे, समाजलय तुका जावचा आसा, आश्रम बघूक... बरोबर काका, काकीबाय, मास्तर, मास्तरीणकाकी, गुरव सगळे आसत, तेह्वा तशी चिंता करा नको, काय तुका येकट्याकच धाडणव नाऽऽय.... पण थय सगळा डोळे उघडे ठेवन बघ, समाजलय मां तुका जावचा आसा, आश्रम बघूक... बरोबर काका, काकीबाय, मास्तर, मास्तरीणकाकी, गुरव सगळे आसत, तेह्वा तशी चिंता करा नको, काय तुका येकट्याकच धाडणव नाऽऽय.... पण थय सगळा डोळे उघडे ठेवन बघ, समाजलय मां येकदम वेवस्थिशीर रिपोर्ट मिळाक व्हयो हयसर, कितपत पाण्यात आमी आसव ता कळाक व्हया येकदम वेवस्थिशीर रिपोर्ट मिळाक व्हयो हयसर, कितपत पाण्यात आमी आसव ता कळाक व्हया आपले अडाणी कोकणी लोक म्हणान कोणी शेंडी लावूक जातीत, तर तसा होता कामा नयेऽऽऽ, आयला मा ध्येनात आपले अडाणी कोकणी लोक म्हणान कोणी शेंडी लावूक जातीत, तर तसा होता कामा नयेऽऽऽ, आयला मा ध्येनात\nसुमल्याचो वासलेलो आ अजून तसोच होतो, आता शेहराकडे जाणा तेका तसा नवीन नव्हता, पण तेची आपली ठरलेली वारी होती, आणि एक मामाचा ठिकाण सोडून अजून खयच ता फारसा जावक नाय होता. आणि आता एकदम आश्रम बघूक जावचा\n समाजला का नाय तुका जातलय मां\n काय सांगतय तरी काऽऽय.... खराच सांगतसय का भगल करतसय माका नेतत आश्रम बघूऽऽऽक माका नेतत आश्रम बघूऽऽऽक रे, रव रे, चाय हाडतय इल्ली......\"\nचाय बरोबर सुमल्यान बाबल्यापुढे रव्याचो लाडू पण ठेवलो चाय आणि लाडू खात खात बाबल्यान आयुष्यात पहिल्या खेपेकच सुमतीक सूचनाच सूचन दिले अन सुमल्यान पण ते ऐकान घेतले. प्रथमच असा दृश्य दिसला की सुमल्याचा त्वांड बंद आणि बाबल बोलतासा चाय आणि लाडू खात खात बाबल्यान आयुष्यात पहिल्या खेपेकच सुमतीक सूचनाच सूचन दिले अन सुमल्यान पण ते ऐकान घेतले. प्रथमच असा दृश्य दिसला की सुमल्याचा त्वांड बंद आणि बाबल बोलतासा सुमल्याची ओसरी हो ट्रान्स्फ़र शीन बघान धन्य झाली सुमल्याची ओसरी हो ट्रान्स्फ़र शीन बघान धन्य झाली पण गावच्या इज्जतीचो आणि भलायकीचो सवाल होतो ना\nआणि मग, प्रस्थानाचो दिवस उजाडलो एव्हाना, महाराज पण बाकीच्या पंचक्रोशीत फिरणार होते, आजूबाजूच्या गावातल्या लोकांक त्येंच्या पवित्र दर्शनाचो लाभ देणार होते, आणि काय काय करुचो त्येंचो विचार होतो हे त्या श्रीकृष्णाकच ठावक होता\nआश्रमाक जातले लोकांच्या प्रवासाखातेर, एका भक्ताची आरामदायक क़्वालिस डायवर सकट तयारच होती, तर, शुभस्य शीघ्रम म्हणत, बर्‍याश्या मुहूर्तावर, सगळा लटांबर गाडीत बसून आश्रमाच्या वाटेक लागला येकदाचा.....\nसुहृद - भाग ६\nसुहृद - भाग ५\nसुहृद - भाग ४\nसुहृद - भाग ३\nसुहृद - भाग २\nसुहृद - भाग १\nमराठीचिये पाईंका वक्र पाहे....\nमाझिया मना जरा सांग ना\nप्रतिबिंब - आणि हा ब्लॉग बघणीय पण :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/icc-chief-david-richardson-statement-dhoni-dravid-136285", "date_download": "2018-08-18T08:45:05Z", "digest": "sha1:SDLRK4JACYUOGBYDJSIBXA2G4C2S6E7F", "length": 13739, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "ICC chief David Richardson statement on dhoni, dravid कोहली, स्टोक्‍स हवेतच; पण धोनी, द्रविडचा आदर्शही हवा | eSakal", "raw_content": "\nकोहली, स्टोक्‍स हवेतच; पण धोनी, द्रविडचा आदर्शही हवा\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nक्रिकेटविश्‍वात विराट कोहली आणि बेन स्टोक्‍ससारखी आकर्षक व्यक्तिमत्त्वे असली, तरी महेंद्रसिंह धोनी आणि राहुल द्रविडसारख्या आदर्श खेळाडूंचीही क्रिकेटला तेवढीच गरज आहे, असे मत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) सचिव डेव्ह रिचर्डसन यांनी व्यक्त केले.\nलंडन- क्रिकेटविश्‍वात विराट कोहली आणि बेन स्टोक्‍ससारखी आकर्षक व्यक्तिमत्त्वे असली, तरी महेंद्रसिंह धोनी आणि राहुल द्रविडसारख्या आदर्श खेळाडूंचीही क्रिकेटला तेवढीच गरज आहे, असे मत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) सचिव डेव्ह रिचर्डसन यांनी व्यक्त केले.\nमेरिलीबोन क्रिकेट क्‍लबच्या वतीने आयोजित कौड्रे व्याख्यानात ते बोलत होते. रिचर्डसन म्हणाले, \"\"क्रिकेटला महानायक हवे आहेत. कॉलिन मिलबर्न्स, फ्रेडी फ्लिंटॉफ, शेन वॉर्न, विराट कोहली किंवा अगदी बेन स्टोक्‍स ही क्रिकेटमधील आकर्षक व्यक्तिमत्त्वे असतील, पण आम्हाला फ्रॅंक वॉरेल, महेंद्रसिंह धोनी, राहुल द्रविडसारख्या खेळाडूंचे आदर्शही हवे आहेत. जेणेकरून क्रिकेट योग्य मार्गावर चालल्याची खात्री बाळगता येईल.''\nरिचर्डसन यांनी या वेळी आयसीसीसमोर असणाऱ्या आव्हानांचा आणि त्यासाठी करत असलेल्या उपाययोजनांचाही आढावा घेतला. ते म्हणाले, \"\"अलीकडे क्रिकेटमध्ये मैदानात शाब्दिक चकमकी आणि चेंडू कुरतडणे, पंचांचा निर्णय न पटल्यास खेळायला न जाणे, बाद झाल्यावर चित्रविचित्र हावभाव करणे असे प्रकार वाढत आहेत. आम्हाला विश्‍वासमोर क्रिकेटचा हा चेहरा आणायचा नाही. म्हणूनच धोनी, द्रविडसारख्या खेळाडूंची क्रिकेटला गरज आहे.''\nमैदानावर खेळाडूंचा आक्रस्ताळेपणा रोखण्यासाठी आयसीसीने कारवाईला सुरवात केली असून, अशा कृत्यात दोषी आढळणाऱ्या खेळाडूस 12 एकदिवसीय सामन्यांची किंवा सहा कसोटी सामन्यांच्या बंदीला सामोरे जावे लागेल, असा इशाराही रिचर्डसन यांनी या वेळी दिला.\n-खेळभावना जपण्याबाबत आयसीसी खेळाडूंना जागरूक करत आहे\n-यजमान संघाने दौऱ्यावर आलेल्या पाहुण्या संघाचा सन्मान करायला हवा\n-प्रत्येक जिंकण्यासाठीच खेळत असतो, पण त्यासाठी काही केले जाऊ नये\n-खेळाडूंवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रशिक्षकांची असते, ती त्यांनी टाळू नये\n-चेंडू कुरतडण्याचे किंवा त्याची स्थिती बदलण्याचे प्रकार वाढत आहेत. यात जर कुणी दोषी आढळला, तर त्याच्या बचावासाठी कुणी पुढे येऊ नये\nसंग्रामपूर : वाण धरण ६५ टक्के भरले\nसंग्रामपूर : सातपुडा पर्वतामधील तीन जिल्ह्यांसाठी जलसंजीवनी ठरलेले वाण धरण 65 टक्के भरले आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या ...\nपिंपळवंडीला मानव-बिबट सहजीवन जनजागृती\nजुन्नर - पिंपळवंडी ता.जुन्नर येथे मानव व बिबट संघर्ष व सहजीवन याविषयी मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती करण्यात आली. जुन्नर वन विभाग तसेच...\nविद्यार्थ्यांची जबाबदारी शिक्षकांबरोबर पालकांचीही - प्राध्यापक पंकज गावडे\nनवी सांगवी (पुणे) - \" चारित्र्यवान साने गुरूजींचे जीवन हे त्यांच्या शिक्षकांबरोबर त्यांची वात्सल्यसिंधु आईच्या संस्कारामुळे घडले, त्यामुळे...\nथ्री डी कोलाजमधून साकारले शिवचरित्र\nइचलकरंजी - जिद्द आणि चिकाटी ठेवत तब्बल ७ वर्षे परिश्रम घेत, येथील डॉ. ज्योती दशावतार बडे यांनी थ्री डी कोलाजमधून अवघे शिवचरित्र साकारले आहे. हा...\nपावसमध्येही होमिओपॅथिक हॉस्पिटल उभारू - राऊत\nरत्नागिरी - हार-तुऱ्यांसाठी आमची पदे नाहीत. जनसेवेची आमची भूमिका आहे. १०० टक्के समाजकार्य करून तुमचे आशीर्वाद मिळविण्यातच आम्हाला धन्यता मिळते....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/nationwide-closure-transporters-july-20-130654", "date_download": "2018-08-18T08:44:52Z", "digest": "sha1:FI3PUR32TBPSY43U22VS2UQY5XJQG3WJ", "length": 10971, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "The nationwide closure of the transporters on July 20 वाहतूकदार जाणार 20 जुलैपासून देशव्यापी संपावर | eSakal", "raw_content": "\nवाहतूकदार जाणार 20 जुलैपासून देशव्यापी संपावर\nरविवार, 15 जुलै 2018\nडिझेलचे वाढते भाव, टोल शुल्क आणि थर्ड पार्टी इन्श्‍युरन्स प्रीमियममध्ये झालेल्या वाढीविरुद्ध देशभरात संप पुकारला होता. मात्र, त्यानंतर चर्चेच्या नावाखाली सरकार वेळकाढूपणा करीत आहे. त्यामुळे 20 जुलैला होणाऱ्या संपात आम्ही सहभागी होण्याचा विचार करीत आहोत.\n- मोहिंदरसिंग घुरा, राज्य सचिव, ट्रक चालक-मालक संघटना.\nमुंबई : इंधन दरावाढीमुळे हैराण झालेल्या मालवाहतूकदारांनी अनिश्‍चित काळासाठी संप पुकारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. 20 जुलैपासून संपाची घोषणा ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट कॉंग्रेस (एआयएमटीसी) यांनी केली.\nयापूर्वी ऑल इंडिया कॉन्फेडरेशन ऑफ गुड्‌स व्हेईकल ओनर्स असोसिएशन डिझेलचे वाढते भाव, टोल शुल्क आणि थर्ड पार्टी इन्श्‍युरन्स प्रीमियममध्ये झालेल्या वाढीविरुद्ध 18 जूनला अनिश्‍चित काळासाठी संप पुकारला होता.\nसरकारने चर्चेसाठी निमंत्रण दिल्यानंतर चार दिवसांनी हा संप मागे घेण्यात आला होता. मात्र, पुन्हा माल वाहतूकदारांनी संपाचा इशारा दिल्याने औद्योगिक, भुसार माल वाहतूक, आयात-निर्यातीवर संपाचा परिणाम होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. देशभरात एकच परमीट असावे, अशी मागणी करीत खासगी प्रवासी वाहतूक संघटनाही या संपात सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nसमस्या सोडवण्यासाठी नाशिकला भरणार शिक्षकांचा दरबार\nयेवला - शिक्षकांच्या विविध रखडलेल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी नाशिकमध्ये विभागातील शिक्षकांचा शिक्षक दरबार गुरुवारी (ता.२३) आयोजित करण्यात आला...\nपंतप्रधान मोदी केरळमध्ये दाखल ; पुरपरिस्थितीचा आढावा घेणार\nतिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरात आत्तापर्यंत 300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर कोट्यवधींचे...\nपावसमध्येही होमिओपॅथिक हॉस्पिटल उभारू - राऊत\nरत्नागिरी - हार-तुऱ्यांसाठी आमची पदे नाहीत. जनसेवेची आमची भूमिका आहे. १०० टक्के समाजकार्य करून तुमचे आशीर्वाद मिळविण्यातच आम्हाला धन्यता मिळते....\nबापजी गेले. आज पुन्हा एकदा माझ्या डोक्‍यावरचे वडिलांचे छत्र हरपले. निव्वळ अवर्णनीय दु:खाचा दुसरा आघात आज माझ्यावर झाला आहे. मन एका क्षणात...\nकर्नाटक पोलिसांचा 'सनातन'भोवती फास\nप्रा. कलबुर्गी, गौरी लंकेश हत्येचे धागेदोरे जुळू लागले मुंबई - प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/sakal-relief-fund-maavdi-supe-showed-path-prosperity-115269", "date_download": "2018-08-18T08:44:39Z", "digest": "sha1:LCQ736ZWXV52WCRI6LCJL4IZ24TWWTDE", "length": 16348, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "sakal relief fund Maavdi-Supe showed the path of prosperity ‘मावडी-सुपे’ने दाखविला समृद्धीचा मार्ग | eSakal", "raw_content": "\n‘मावडी-सुपे’ने दाखविला समृद्धीचा मार्ग\nगुरुवार, 10 मे 2018\nपुणे - पुरंदर तालुक्‍यातील मावडी-सुपे गावातील ओढ्यावर ‘सकाळ’च्या मदतीतून पहिला बंधारा बांधला. त्यानंतर गावात आजमितीला सोळा बंधारे झाले आणि त्याने जलसमृद्धी आली. अशा गावांमध्ये एक कोटी लिटरपासून ते ४५ कोटी लिटरपर्यंत जलसाठा झाला. जलसंधारणाच्या अभियानाला एकीचे बळ, गावकऱ्यांची इच्छाशक्ती आणि कृतिशीलतेची जोड मिळाल्याने ही चळवळ गावात कायमस्वरूपी विस्तारत राहिली. साहजिकच त्याने दुष्काळात टॅंकरचे पाणी पिणाऱ्या गावांत ऐन उन्हाळ्यात नद्या, ओढ्यात पाणी खेळू लागले, विहिरींना पाणी राहिल्याने बागायतीचे क्षेत्र विस्तारले.\nपुणे - पुरंदर तालुक्‍यातील मावडी-सुपे गावातील ओढ्यावर ‘सकाळ’च्या मदतीतून पहिला बंधारा बांधला. त्यानंतर गावात आजमितीला सोळा बंधारे झाले आणि त्याने जलसमृद्धी आली. अशा गावांमध्ये एक कोटी लिटरपासून ते ४५ कोटी लिटरपर्यंत जलसाठा झाला. जलसंधारणाच्या अभियानाला एकीचे बळ, गावकऱ्यांची इच्छाशक्ती आणि कृतिशीलतेची जोड मिळाल्याने ही चळवळ गावात कायमस्वरूपी विस्तारत राहिली. साहजिकच त्याने दुष्काळात टॅंकरचे पाणी पिणाऱ्या गावांत ऐन उन्हाळ्यात नद्या, ओढ्यात पाणी खेळू लागले, विहिरींना पाणी राहिल्याने बागायतीचे क्षेत्र विस्तारले.\nखोलीकरण, गाळ काढणे, रुंदीकरण, सरळीकरण, पंप आणि बंधारा दुरुस्ती, बंधारे बांधणे इत्यादी कामे ‘सकाळ माध्यम समूहा’ने सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून हाती घेतली. ग्रामसभेच्या पूर्वसंध्येला गावातील महिलांच्या सभेत तनिष्का सदस्यांनी जलसंधारणाचा विषय मांडून पाणीप्रश्‍नावर चर्चा घडवली. दुसऱ्या दिवशीच्या ग्रामसभेत गावकारभाऱ्यांनी, ग्रामस्थांनी त्याला पाठिंबा दिला. ग्रामसभेत ठराव झाले. सकाळची मदत, मार्गदर्शन घेण्याचे ठरले. अशा पद्धतीने जलसंधारणाच्या कामात पुढे येणाऱ्या प्रत्येक गावाला ‘सकाळ रिलीफ फंडा’ने दोन लाखांची मदत दिली. गावकऱ्यांनी तेवढाच वाटा; तर काही ठिकाणी तर ‘सकाळ’च्या दोन लाखांत गावकऱ्यांनी दहा लाखांपर्यंत स्वतःची रक्कम जमा केली. श्रमदान झाले. कोणी जेसीबी मोफत दिले, तर कोणी काम करणाऱ्यांच्या चहापान-भोजनाची व्यवस्था केली. सारा गाव झपाटून जलसंधारणात गुंतून गेला. निर्धारित वेळेत काम झाल्याने पावसाळ्यात बहुतांश गावांतील जलस्त्रोतांमध्ये पुरेसा साठा झाला. गावकऱ्यांचा उत्साह दुणावला. काही गावांनी त्यानंतर अनेक संस्था-संघटनांच्या मदतीने साखळी बंधाऱ्यांची संख्या वाढविली.\nजलसंधारणाच्या कामातून नद्या, ओढा, नाल्यातून निघालेला गाळ शेतकऱ्यांनी स्वखर्चाने नेला. त्यांनी तो मुरमाड, पडीक जमिनीत टाकल्याने जमिनीची सुपीकता वाढली. वहिवाटी खालील जमिनीचे प्रमाण वाढले.\n‘सकाळ रिलीफ फंडा’च्या माध्यमातून जलसंधारणाचे काम करीत असताना पारदर्शकता, परिणामकारक कार्यपद्धती यांचा अवलंब केला जातो. सरकारी यंत्रणेकडून कामाच्या अंदाजपत्रकाची खातरजमा केली जाते आणि प्रत्यक्षात काम झाल्यानंतर ते तेवढ्या रकमेचे आणि त्या आकाराचे झाले की नाही, हे तपासून घेतले जाते. अनेकदा, दिलेल्या रकमेच्या दुप्पट किंवा त्याहून अधिक काम यातून झाल्याचे निदर्शनाला येते. याला जबाबदार असतो तो लोकसहभाग आणि गावकऱ्यांचा उत्साह. त्यांच्या सहभागाने मोठे काम कमी खर्चात उभे राहिल्याचे निदर्शनाला आले आहे.\nजलसंधारणाचे काम करताना ओढ्यांवर अतिक्रमणे झाल्याचे निदर्शनास आले. मात्र, या कामात सारा गाव जुंपल्याने ही अतिक्रमणे संबंधितांनी स्वतःहून काढून घेतली अन्‌ ओढ्या-नाल्याचे क्षेत्र मोकळे झाले. यानिमित्ताने काही ठिकाणचे वर्षानुवर्षांचे हद्दीचे तंटेही निकाली निघाले.\nसंग्रामपूर : वाण धरण ६५ टक्के भरले\nसंग्रामपूर : सातपुडा पर्वतामधील तीन जिल्ह्यांसाठी जलसंजीवनी ठरलेले वाण धरण 65 टक्के भरले आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या ...\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून सहाजण जखमी\nबेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने बंगळूरकडे जाणारी व्हीआरएलची आराम बस उलटून चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय...\nचिंचवडमध्ये रविवारी रंगणार महिला प्रेरणा संमेलन\nवाल्हेकरवाडी - स्वयंसिद्धा प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड शहर) आणि प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि. 19 ऑगस्ट) चिंचवड...\nघरकामगार, बांधकाम मजूर महिलांची उपेक्षाच\nजळगाव : दिवसरात्र काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, पण डोक्‍यावर हक्काचं छत नाही...सतत कष्ट करूनही पदरी काहीच न पडल्यामुळे अनेकदा उपवास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-205/", "date_download": "2018-08-18T08:01:38Z", "digest": "sha1:DAJZEFQLXB6PPFBRP6P5JSAFSHY2WOKY", "length": 5018, "nlines": 134, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अर्थवाणी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचीन आणि दक्षिण आशियातून होणाऱ्या अवैध बॅटऱ्यावर प्रतिबंध लावला गेला आहे. त्याचबरोबर या बॅटऱ्यांच्या आयातीवर अधिक शुल्क लावले आहे. त्यामुळे एव्हरेडी कंपनीचा महसूल 10 ते 15 टक्‍क्‍यांनी तर नफा 30 ते 35 टक्‍क्‍यांनी वाढेल.\n-अमृतंशू खेतान (व्यवस्थापकीय संचालक एव्हरेडी)\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleओसामाच्या मुलाचा महंमद अट्टाच्या मुलीशी विवाह\nNext articleकॉन्टिफ चषक फुटबॉल स्पर्धा : भारताचा बलाढ्य अर्जेंटिनावर 2-1 ने विजय\nअलाहाबाद, आयडीबीआय बॅंकेच्या तोट्यात झाली वाढ\n60 हजार महिला डिजिटल साक्षर\nतुर्कस्तानातील पेचामुळे रुपया ऐतिहासिक नीचांकावर\nमहागाई घसरल्याने शेअर निर्देशांकांत भरीव वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://kisanmaharashtra.blogspot.com/2018/07/blog-post.html", "date_download": "2018-08-18T08:50:53Z", "digest": "sha1:JKAFO26ZKYYDLEE6B6AWKS4NK5TDG7ZH", "length": 9098, "nlines": 94, "source_domain": "kisanmaharashtra.blogspot.com", "title": "All India Kisan Sabha, Maharashtra: अखिल भारतीय किसान सभेच्या राष्ट्रीय कौन्सिल सभेची बुलंद हाक - आगामी देशव्यापी संघर्ष जबरदस्त प्रमाणात यशस्वी करा!", "raw_content": "\nअखिल भारतीय किसान सभेच्या राष्ट्रीय कौन्सिल सभेची बुलंद हाक - आगामी देशव्यापी संघर्ष जबरदस्त प्रमाणात यशस्वी करा\nअखिल भारतीय किसान सभेच्या राष्ट्रीय कौन्सिलची सभा १८-२० जुलै दरम्यान राजपालयम, जि. विरुधूनगर, तामिळनाडू येथे होत आहे. तिची सुरुवात किसान सभेचे ज्येष्ठ उपाध्यक्ष एस. आर. पिल्ले यांच्या हस्ते झालेल्या ध्वजारोहणाने झाली. सहसचिव एन. के. शुक्ला यांनी शोकठराव मांडला.\nअध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सद्य राजकीय आव्हानांचा परामर्श घेतला. सरचिटणीस हनन मोल्ला यांनी अहवाल मांडताना देशाच्या कृषी क्षेत्रातील गंभीर परिस्थितीचे विश्लेषण करून चळवळ आणि संघटनेसंबंधीची पुढील महत्वाची कार्ये मांडली.\nया सभेसाठी देशभरातून सुमारे १०० किसान नेते उपस्थित आहेत. त्यापैकी २५ जणांनी अहवालावर आपले विचार मांडले. चर्चा उत्साहवर्धक आहे आणि विविध राज्यांत किसान सभा शेतकरी प्रश्नांवर करत असलेल्या स्वतंत्र व संयुक्त संघर्षाचे त्यात प्रतिबिंब पडत आहे.\nमहाराष्ट्रातर्फे सुभाष चौधरी (नाशिक) आणि सिद्धप्पा कलशेट्टी (सोलापूर) यांनी अहवालावरील चर्चेत चांगला भाग घेतला. त्याव्यतिरिक्त किसन गुजर (राज्य अध्यक्ष), अर्जुन आडे (नांदेड) आणि रडका कलांगडा (ठाणे-पालघर) हे या सभेत हजर आहेत. राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले महाराष्ट्रातील दुधाच्या आंदोलनात गुंतले असल्यामुळे ते येऊ शकलेले नाहीत. महाराष्ट्र राज्य किसान सभेचे मुखपत्र 'किसान संघर्ष'च्या लॉंग मार्च विशेषांकाच्या प्रती सर्व केंद्रीय किसान कौन्सिल सदस्यांना देण्यात आल्या.\nकिसान सभेच्या राष्ट्रीय कौन्सिलच्या सभेने पुढील आंदोलने जबरदस्त प्रमाणात यशस्वी करण्याची बुलंद हाक दिली - १० कोटी सह्यांची मोहीम, ९ ऑगस्टचे प्रत्येक जिल्ह्यातील देशव्यापी जेल भरो आंदोलन, ५ सप्टेंबरची दिल्लीतील मजदूर किसान संघर्ष रॅली, नोव्हेंबर महिन्यातील संसदेवरील किसान मुक्ती लॉंग मार्च आणि किसान सभेची ५ कोटी रुपयांची संघर्ष निधी मोहीम.\nया सर्व आंदोलनांचे लक्ष्य अर्थातच मोदी-प्रणित भाजप-आरएसएस सरकारची शेतकरीविरोधी, कामगारविरोधी आणि जनविरोधी धोरणे आणि त्याची धर्मान्ध व जातपातवादी कारस्थाने असणार आहे.\nया सभेत महत्वाच्या प्रश्नांवर ठरावही होणार आहेत. आज सायंकाळी राजपालयम गावात मोठी जाहीर सभा होणार आहे आणि उद्या दुपारी या कौन्सिल सभेची सांगता होणार आहे\nअखिल भारतीय किसान सभेच्या राष्ट्रीय कौन्सिल सभेची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-recruitment-shivaji-university-123399", "date_download": "2018-08-18T08:33:43Z", "digest": "sha1:E6X6WKIKOQAAV5XACBPSO3Q7FA2WQL3P", "length": 11533, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News recruitment in Shivaji University ‘नीम’अंतर्गत भरणार शिवाजी विद्यापीठात पदे | eSakal", "raw_content": "\n‘नीम’अंतर्गत भरणार शिवाजी विद्यापीठात पदे\nबुधवार, 13 जून 2018\nकोल्हापूर - शिवाजी विद्यापीठातील काही रिक्त पदे नॅशनल इम्पलॉयबिलिटी ऑफ इनहान्समेंट मिशन (नीम) रेग्युलेशन अंतर्गत भरण्यास व्यवस्थापन परिषदेत आज मान्यता दिली. किमान सहा महिने व जास्तीत जास्त तीन वर्षे पदांवर काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.\nकोल्हापूर - शिवाजी विद्यापीठातील काही रिक्त पदे नॅशनल इम्पलॉयबिलिटी ऑफ इनहान्समेंट मिशन (नीम) रेग्युलेशन अंतर्गत भरण्यास व्यवस्थापन परिषदेत आज मान्यता दिली. किमान सहा महिने व जास्तीत जास्त तीन वर्षे पदांवर काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.\nया पदांवर कामातून त्यांचे ‘स्किल’ वाढावे, हा हेतू असल्याचे सांगण्यात येते. परदेशी विद्यार्थ्यांना विद्यापीठातील विविध अधिविभाग व संलग्नित महाविद्यालयांत पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश देण्याबाबतच्या नियमावलीस मान्यता देण्यात आली. एम. बी. ए. युनिटमध्ये पी. जी. डिप्लोमा इन ई-बिझनेस, दूर शिक्षण केंद्रांतर्गत बी. ए. होम सायन्स, एम. ए. सायकॉलॉजी व एम. पी. एड. अभ्यासक्रम सुरू करण्यासही मान्यता दिली आहे. तसेच अधिविभागांत ॲडजंक्‍ट प्रोफेसर, रिसर्च प्रोफेसरांची नेमणूक करण्यासह विद्यापीठ व आयआयजीएम (नवी मुंबई) यांच्यातील सामंजस्य कराराच्या नूतनीकरणासही मान्यता देण्यात आली.\nबारामती - विद्या प्रतिष्ठानच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पुरस्कार\nबारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nउंड्री - पाचव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजूर ठार\nउंड्री - गुलाम अली नगर गल्ली नं 6 दि.13 ऑगस्ट दु.12.30 वाजता एका निर्माणाधीन इमारतीचे काम सुरू असताना पाचव्या मजल्यावर पडून राजशेखर माशाले (वय 33...\nपिंपळवंडीला मानव-बिबट सहजीवन जनजागृती\nजुन्नर - पिंपळवंडी ता.जुन्नर येथे मानव व बिबट संघर्ष व सहजीवन याविषयी मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती करण्यात आली. जुन्नर वन विभाग तसेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://abhijeetnit5.wordpress.com/", "date_download": "2018-08-18T08:26:56Z", "digest": "sha1:Q3HHW7S6N3WBJHYLKZBA2KIZJUXWRSRU", "length": 23075, "nlines": 274, "source_domain": "abhijeetnit5.wordpress.com", "title": "experience it – Life is a game nd we will have to play it zest fully", "raw_content": "\nजिन्हें कभी देख कर भी किया था\nना देखने का ढोंग\nवो कभी इस तरह ज़िन्दगी के करीब आने जा रहे \nवो मस्ती भरी निगाहे\nजिनमे छुपी थी क्यूट सी प्यारी सी एक दुनिया\nउस दुनिया में हम खोने जा रहे \nगौर से देखा तो लगा\nपरियो के परियो से हम रूबरू हुए\nएक परी के दुनिया में हम रहने जा रहे \nबातों से जिसकी झलकती\nउसकी एक शरारत भरी दुनिया\nउसकी शरारत के हम दीवाना बनने जा रहे \nउसकी नज़ाकत भरी निगाहें\nदिल को खामोश सा करने लगी\nवो हमे दुनिया से अलग करने जा रहे \nखुलती जब जुल्फे उनकी\nथम जाती निगाह उन पे\nवो हमे आज़ाद करने जा रहे \nहिलते जब ओंठ उनके\nलगता चूम कर बनालू उन्हें अपना\nउन हिलते ओंठो में हम सिमटने जा रहे \nबाते उनकी जैसे हों\nकिसी गाने के मीठे बोल\nउन बोल पर हम मरने जा रहे \nज़िन्दगी के सपनो का एक-एक धागा बुनने लगा\nउनका दूर होना हमारे सपनो में यादों का कारवां बनने जा रहा \nपकड़ा जब हाँथ उनका\nरुक गया था पल वो हमारा\nवो हाँथ हमेशा के लिए फिसलता जा रहा \nदेखती जब वों आँखों में हमारी\nलगता हो गयी हर ख्वाहिश पूरी\nएक ख्वाहिश कशिश बन कर होंठो पे सजने जा रही \nउनके दिए हुए कुछ हसींन पल\nआज बी दिल में सुलगते अरमान बरसाते है\nबिन बारिश में भी ये हमे भिगोने जा रहा \nआखिर में कहु भी तो क्या कहु…\nअक्सर किसी की तारीफ़ में आपने सुना होगा\nतू चाँद है या चाँद तेरा टुकड़ा\nलेकिन हमे तो दिल से अपना लगा\nइन सब से बेहद खूबसूरत आपका मुखड़ा \nRhythm – एक नन्ही परी\nजिसे देख दिल हुआ खुशनुमा\nऐसी Rhythm एक नन्ही परी…\nआतेही थी गुमसुम जरासी\nबाद में छायी जैसे हो\nआने लगा हमे मजा\nऐसी rhytm एक नन्ही परी…\nबोली जिसकी लगी प्यारी\nहँसती खुदा से भी न्यारी\nजैसे हो सरगम छायी\nऐसी rhytm एक नन्ही परी…\nना डरती वो किसी से\nजैसे हो डर की शहजादी\nख्वाबो में भी नही सोचा\nऐसी rhytm एक नन्ही परी…\nगॉगल और पर्स में\nबाहुबली को भी ना मिली\nऐसी rhythm एक नन्ही परी..\nपत्ता पत्ता हो गया वाकिफ\nआगयी जुबां पे हसि\nजब सुनी उसकी मीठी बोली\nऐसी rhytm एक नन्ही परी…\nअब गूंजती है कानों में\nऐसी rhythm एक नन्ही परी…\nदो दिन मानो ऐसे बिते\nजैसे ज़िन्दगी हो हमे प्यारी\nखुदा से मांगे भी तो और क्या बस\nrhythm एक नन्ही परी….\nशब्द हेच जवळ आणतात\nशब्द हेच दूर नेतात\nशब्द हे वस्त्र आहे\nशब्द हे अस्त्र आहे\nशब्द हेच वस्त्रहीन करतात\nशब्द हेच वस्त्र पुरवतात\nशब्दांची किमया ही न्यारिच\nकशाही सामोर चांगले लागल्यास\nकशाही सामोर वाईट लागल्यास\nशब्द हेच इछेला वासना बनवतात\nआणि वासनेला इच्छा बनवतात\nशब्द हेच शत्रुत्व बनवतात\nशब्द हेच मित्रत्व बनवतात\nनात्यांमधे कडु घास घालतात\nनात्यांमधे गोड घास घालतात\nबोचुन बोचुन घायाळ करतात\nन दिसता रक्तबम्बाळ करतात\nओले घाव मनास घालतात\nशब्द हेच अश्रु आणतात\nशब्द हेच अश्रु पुसतात\nखारट तुरट तिखट मिठ्या\nशब्द हेच कणखर बनवतात\nशब्द हेच उत्तेजित करतात\nशब्द हेच प्रवुत्त करतात\nजिंकलेल्याला हरल्याची माळ घालतात\nतर प्रेमाला द्वेषाची साथ करतात\nशब्द हेच पाण्याला अमृत\nतर अमृताला पानी बनवतात\nशब्द हेच ईश्वराला मानव\nतर मानवाला ईश्वर बनवतात\nशब्दांवर स्वार होन एक कलाच\nशब्दांची रांगोळी घालावि ही जपून\nलागलेला दाग आणि निघलेला शब्द\nनाही येत परत या मुखी\nशब्द तुझे असो वा माझे\nअसो गोडवा त्यात सदा\nबहरतील बघा मग आयुष्य\nसजवलेल्या या शब्दांच्या रांगोळीने..\nमनाला हुरहुर लावून गेल\nमन भरून आले,कंठ दाटूनी आला\nडोळे ओलेचिंब झाले,हुंदका फुटायला आला….\nतुझ्या चेहरयावरील तेज आजही तसच होत\nज्याकडे कधी मि आकर्षित झालो होतो\nतुझी बघ्न्याची अदा आजही निराळीच् होती\nनिळेशार डोळे तुझे आजही काही खुनावत होते….\nमधुर संगीता सारख होत\nविजेच्या कड़कड़ाडीपेक्षा कमी नव्हतं…\nतुझ्या ओठांच हलन जणू\nमाझ ह्रदय धड़कवत होत\n‘आहे की नाही म्हटल’ हे ऐकत\nमाझ आयुष्य जात होत…\nतुझ्या दुःखात मि स्व:ताला सामावून घेतल\nदुःख तुझ असायच,रात्र मि जागायचो\nछोट्या-छोट्या गोष्टींवर चिड़न तुझा स्वभावगुण होता\nचिडल्यानंतर तुला सांभाळण माझ्या आयुष्याचा भाग होता..\nतुझ्या एका कॉल वर मि धावत यायचो\nतुझ्यासोबत वेळ कसा घालवायला मिळेल याचे बहाने शोधायचो\nतू सोबत असतांना तुझ्यात हरवून जायचो\nतुच माझ अस्तित्व हे सारख अनुभवत असायचो..\nतूच माझ जग हे समजून बसलो\nबाकीच्या जगाला विसरून बसलो\nतुझ्या जगात विसावायला बसलो\nस्व:ताला त्यात हरवून बसलो…\nसोबत घालवलेले क्षण आपले होते\nआठवणी मात्र माझ्या होत्या\nमाझ्या आठवणीत तू नेहमी होती\nतुझ्या आठवणीत मि मात्र कधीच नव्हतो….\nमनाला हुरहुर लावून गेल…\nतुझ्यासोबत घालवलेले काही क्षण अजूनही मनात घर करुण आहेत.तुला एकदा विचारले असता की तुला तुझ्यातलि कोणती गोष्ट आवडते तर तू बोललिस तुला तुझ हसन फ़ार आवडत का तर तुझ्या गालावर पड़त असलेल्या खळी मुळे.अग वेडे तुझ्या त्या गालावरील खळीबद्दल जेवढ तुलाही कदाचित माहिती नसनार तेवढ़ मि जाणतो.कारण ती एकच गोष्ट कारणीभूत आहे मला तुझ्या प्रेमात पाडायला.तिने अस गुंतवलय मला तुझ्यात ज्यातन आता मला बाहेर पडायला मार्ग दिसेनासा झाला.\nतुझ्या ती गालावरील खळी मला एखाद्या फुलाप्रमाने वाटते.पण,असे फूल जे काही वेळा करताच फुलत.पण ज्याच्या फुलन्याने सर्वांच्या चेहऱ्यावर एक स्मिथहास्य बहरते.अशी तुझ्या गालावरील खळी माझ्याकरता आहे.\nसकाळी गवतांवर जसे दवबिंदु पडतात आणि लक्षपूर्वक बघितल्यास अस जाणवते ते दवबिंदु जणु त्या गवताला सौंदर्य प्रदान करतात.अगदी त्याचप्रमाणे तुझ्या गालावरील खळी ही तुला निस्सीम असे सौंदर्य प्रदान करते जे क्वचितच मि कुठे बघितले असणार.कधी बघितले नाही असे म्हटले तरी चालेल.तुझ्या गालवरील खळी ही माझ्या आयुष्याचा चंद्र आहे जे तुला तर सौंदर्य प्रदान करतेच् पण माझ्या काळोख आयुष्याला प्रकाश सुद्धा देते.\nतू रोज माझ्याशी बोलायची नेहमी टेक्स्ट करत राहायची,जवळपास कोणी नसले तर मिस्ड कॉल द्यायची,मि तुला परत कॉल करेल याची वाट बघायची.हे रोजच रूटीन झाले होते मला सुद्धा याची सवय झाली होती.माझ्या रोजच्या बिजी दिवसातला वेळातला वेळ काढून मि तुझ्याशि बोलायचो.सर्व काही फार छान वाटायच.तुझा मेस्सेज आला की म्हणून सारखा फ़ोन चेक करायचो.पण आता नुसता फ़ोन चेक करतो कारण आता तुझे मिस्ड कॉल सुद्धा नाही दिसत आणि नाही तुझे मेस्सेज.मि मेस्सेज केला तर त्यावर तुझा प्रतिसाद सुद्धा नाही मिळत.तुझ हे न सांगता अचानकपने आयुष्यातन निघुन जान मनाला फार खटकल.\nपण कदाचित तुझ्या गालावरील ति खळी आयुष्यभर बघन माझ्या नशिबात नसेल.कारण दुर्दैवाने तूच मला तुझ्या आयुष्यातन दूर धकलशील. तरिसुद्धा तुझ्या गालावरील खळीत का दिवसेंदिवस गुंतत चाललो आहे मला कळेनासे झालय.खरच कळेनास झालय.कदाचित हेच माझ नशिब असाव.एका गुंतलेल्या मानसाच आयुष्य पुन्हा गुंतेल.मि रंगवलेले स्वप्न एका क्षणात कोलमडुण पडेल.त्याने तुझ्या आयुष्यात काही फर्क पडणार नाही पण माझ्यात पुन्हा स्वप्न रंगवन्याची हिम्मत राहणार नाही.तुझ्यासोबत रंगवलेली ती रंगीत दुनिया डोळ्यात आसवांच्या रूपाने येईल आणि डोळ्यातील पानी सुकतानां त्या रंगीत दुनियेतले रंग सुद्धा सुकून जातील आणि आयुष्य एका जठरा सारख बनेल.तुझ ते हसन,बोलन,आणि सुन्दर खळी कायम माझ्या आयुष्यात घर करून राहील आणि त्या घरात विसावलेले असणार माझ तुला कधीही न कळालेल प्रेम.पण,तू काळजी नको करू सावरेल मि स्व:ताला आतपर्यन्त सावरलेच आहे सामोरसुद्धा सावरेल.\nपण तू नेहमी हसत रहाव, तुझ्या गालावरील ती सुन्दर माझ आयुष्य गुरफटवणारी खळी फुलत जावी हीच माझी इच्छा आहे. कारण त्या फुलणाऱ्या खळीत लपलय माझ्या आयुष्याच् गुपित जे असच रहस्यमयरित्या हरवनार आहे.ज्याची कुणाला साधी कल्पना सुद्धा येणार नाही.आणि मि कायमचा हरवून जाणार तुझ्या आयुष्यातन कधीही परत न येण्यासाठी…कायमचा.\n” ऐ ज़िन्दगी मत हस मुझ पे..\nक्या हुआ जो वो उम्र भर साथ नहीं तो..\nउनकी कुछ यादें,मिठिसि बातें,और प्यारी\nयही तो मेरी ज़िन्दगी है…..\nमाझे हे प्रेम रस\nतुझ्याच साठी जगतो आहे\nतुझ्याच साठी मरतो आहे\nभिजतो आहे या चिंब पावसात\nना दिसती कुणा माझी ही आसवे\nतुला कळेना तुला कळेना\nतुझी ती गालावरील खळी बघता\nमद्यधुंद झालो असे वाटे मजला\nभुललो मि ज्यात स्वतःला\nअसा रंग तू ऊधळूनि घे\nतुला कळेना तुला कळेना\nशरबती ओठांमधुनि निघणाऱ्या शब्दांनी\nवाऱ्यावर डुलणारया रेशमी केसांवरती\nतुला कळेना तुला कळेना\nझाले हे मन बावरे आता\nना उमजे मला काही तुझ्याविना\nअसतो सदा या विचारात\nकाय झाले मज या मना\nतुला कळेना तुला कळेना\nसाथ दे तू मजला आता\nहवीय सोबती तू या निरागस आयुष्याला\nआयुष्याची गाथा तुझ्याचभोवती गुम्फते आता\nझगडू तरी कसा या आयुष्याशि एकटा\nमाझे हे प्रेम रस\nतुझ्याच साठी जगतो आहे\nतुझ्याच साठी मरतो आहे…..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2018-08-18T09:00:26Z", "digest": "sha1:VBXGFFUIZ5QAKUVBUT7WMH5GL7MF2VYZ", "length": 4765, "nlines": 147, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे १० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे १० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक\nदशके: पू. १० चे पू. ० चे ० चे १० चे २० चे ३० चे ४० चे\nवर्षे: १० ११ १२ १३ १४\n१५ १६ १७ १८ १९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nऑगस्टस सीझर, रोमन सम्राट (इ.स.पू. २७ ते इ.स. १४)\nटिबेरियस, रोमन सम्राट (इ.स. १४ ते इ.स. ३७)\nइ.स.चे १० चे दशक\nइ.स.च्या १ ल्या शतकातील दशके\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील दशके\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/let-pak-players-ipl-38631", "date_download": "2018-08-18T08:43:23Z", "digest": "sha1:LOZAO5K6KTEVPPN77DOO25EMJPNU3EU4", "length": 10516, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Let Pak players in IPL पाक खेळाडूंना आयपीएलमध्ये संधी द्या - ऋषी कपूर | eSakal", "raw_content": "\nपाक खेळाडूंना आयपीएलमध्ये संधी द्या - ऋषी कपूर\nगुरुवार, 6 एप्रिल 2017\nमुंबई - आयपीएलमध्ये जगभरातील सर्व खेळाडूंना संधी दिली जाते; मग पाकिस्तानच्या खेळाडूंनाही खेळू द्या, अशी मागणी अभिनेते ऋषी कपूर यांनी केली आहे.\nमुंबई - आयपीएलमध्ये जगभरातील सर्व खेळाडूंना संधी दिली जाते; मग पाकिस्तानच्या खेळाडूंनाही खेळू द्या, अशी मागणी अभिनेते ऋषी कपूर यांनी केली आहे.\nदहाव्या मोसमाची आयपीएल सुरू होत असताना ऋषी कपूर यांनी ट्विटरवरून पाकिस्तानी खेळाडूंसाठी बॅटिंग केली आहे. अफगाणिस्तानचे महंमद नबी व रशीद खान यांना गतविजेत्या हैदराबादने आपल्या संघात घेतले आहे. सर्व वाद बाजूला ठेवून आपल्यापेक्षा लहान असलेल्या देशातील खेळाडूंना संधी द्यावी, असे म्हणताना ऋषी कपूर यांनी, फिर मॅच होगा, हम बडे लोग हैं, असे शब्द आपल्या ट्विटमध्ये वापरले आहेत.\nसुरवातीच्या आयपीएलमध्ये काही पाकिस्तानी खेळाडू खेळले होते; परंतु मुंबई हल्ल्यानंतर त्यांच्या कोणत्याही खेळाडूला आयपीएल फ्रॅंचाईजीने आपल्या संघात घेतले नाही. त्यानंतर लिलावाच्या यादीतूनही पाक खेळाडूंना वगळण्यात आलेले आहे.\nताडगाव - मोफत आरोग्य शिबिरात गरिब व आदिवासी नागरीकांनी घेतला लाभ\nपाली - सुधागड तालुक्यातील ताडगाव येथे गुड डुअर्स चैरिटीज मुंबई, टिकेडिके परिसर विकास संघर्ष समिती आणि जय भैरवनाथ युवा मित्र मंडळ ताडगांव यांच्या...\nइस्लामाबाद : 'पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ'चे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांनी आज (शनिवार) पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ...\nकारागृह परिसरात बांधकामाची अट उठविली ; अधिसूचना जारी\nसोलापूर : जिल्हा कारागृहाच्या पाचशे मीटर परिसरात बांधकाम न करण्याची अट शासनाने रद्द केली असून, ती शंभर मीटरपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. या...\nभविष्यदर्शी, आधुनिक आणि घटनात्मक राष्ट्रवाद, की वांशिक कल्पनांच्या सहाय्याने तयार होणाऱ्या सामूहिक अस्मितेचा राष्ट्रवाद या दोन ध्रुवांवर अद्यापही...\n'यूपीए' काळातच विकासदर अधिक\nनवी दिल्ली : केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या अहवालाच्या आधारे कॉंग्रेसने मोदी सरकारच्या आर्थिक प्रगतीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/sachin-tendulkar-says-his-mother-started-%E2%80%98sachin-sachin%E2%80%99-chant-44341", "date_download": "2018-08-18T08:24:34Z", "digest": "sha1:VQBFMXZD7WRPUSXXXWZXGWHYTUOYPD4H", "length": 10808, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sachin Tendulkar says his mother started the ‘Sachin, Sachin’ chant 'सचिनऽऽऽ सचिनऽऽऽ' घोषणा माझ्या आईची..! | eSakal", "raw_content": "\n'सचिनऽऽऽ सचिनऽऽऽ' घोषणा माझ्या आईची..\nबुधवार, 10 मे 2017\nसचिनने 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असून, सध्या तो त्याचा चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. 'सचिन सचिन' हे शब्द आयुष्यभर माझ्या लक्षात राहतील, असे सचिनने म्हटले आहे.\nमुंबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मैदानात उतरला की 'सचिन सचिन' ही अख्ख्या स्टेडियमभर दुमदुमणारी घोषणा सर्वप्रथम माझ्या आईने दिल्याचे सचिनने स्वतः सांगितले.\n'सचिन ए बिलियन ड्रीम्स' या चित्रपटातील गाण्याच्या प्रदर्शनावेळी बोलताना सचिनने ही माहिती दिली. सचिन म्हणाला, की मी जेव्हा लहानपणी खाली खेळण्यासाठी जात होतो. तेव्हा आई घरी पुन्हा बोलविण्यासाठी 'सचिन सचिन' असा आवाज द्यायची. त्यावेळी सर्वप्रथम मी हे ऐकले होते. मी कधीही विचार केला नव्हता की 'सचिन सचिन' ही घोषणा माझ्या कारकिर्दीच्या काळातही दिली जाईल. आता चित्रपटगृहातही दिली जात असल्याने मी खूप आनंदी आहे.\nसचिनने 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असून, सध्या तो त्याचा चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. 'सचिन सचिन' हे शब्द आयुष्यभर माझ्या लक्षात राहतील, असे सचिनने म्हटले आहे.\nताडगाव - मोफत आरोग्य शिबिरात गरिब व आदिवासी नागरीकांनी घेतला लाभ\nपाली - सुधागड तालुक्यातील ताडगाव येथे गुड डुअर्स चैरिटीज मुंबई, टिकेडिके परिसर विकास संघर्ष समिती आणि जय भैरवनाथ युवा मित्र मंडळ ताडगांव यांच्या...\nकारागृह परिसरात बांधकामाची अट उठविली ; अधिसूचना जारी\nसोलापूर : जिल्हा कारागृहाच्या पाचशे मीटर परिसरात बांधकाम न करण्याची अट शासनाने रद्द केली असून, ती शंभर मीटरपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. या...\nकोल्हापुरात एक नवी ‘डावी’ चळवळ\nकोल्हापूर - कोल्हापुरात डावी चळवळ सक्रिय आहेच; पण आणखी एक नवी डावी चळवळ कोल्हापुरात उभी रहात आहे. आणि ही चळवळ फक्त डावखुऱ्या (कोल्हापुरी भाषेत...\nलोहोणेरच्या शेतकऱ्यास कर्जासाठी 18 लाखांना फसविणारे दोघे गजाआड\nनाशिक - लोहोणेर (ता. देवळा) येथील शेतकऱ्यास पाच कोटी कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून साडेअठरा लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघा संशयितांना गंगापूर...\nकचरा प्रश्‍नावर महापौरांना प्रतिवादी का करू नये\nऔरंगाबाद - शहरातील कचराप्रश्नी दाखल याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एकत्र सुनावणी झाली. कांचनवाडीच्या याचिकेत महापौरांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/gossips/is-something-cooking-between-prajakta--lalit", "date_download": "2018-08-18T08:18:08Z", "digest": "sha1:OMUN724UA3TN6OJWTDNP6TIR3XBWE3M5", "length": 6498, "nlines": 59, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Is Something Cooking Between Prajakta & Lalit? | Marathi Dhamaal", "raw_content": "\nखरंच प्राजक्ता आणि ललितमध्ये पुन्हा काहीतरी शिजतंय\nकदाचित प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर ही जोडी प्रकाश कुंटे यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहेत...\nकाही ऑन स्क्रिन जोड्या आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकतात आणि मग या आवडत्या जोड्यांना पुन्हा पुन्हा पाहावं असं त्यांना वाटतं, मग ते नाटक, मालिका, सिनेमे यापैंकी कोणतंही माध्यम असो. झी मराठी वाहिनीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेली प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर ही जोडी प्रेक्षकांना खूप भावली. आणि प्राजक्ता माळीने नुकत्याच केलेल्या पोस्टमुळे असं वाटतंय की प्राजक्ता आणि ललित ही जोडी पुन्हा एकत्र येणार आणि ते देखील प्रकाश कुंटे दिग्दर्शित मराठी चित्रपटाच्या माध्यमातून. प्रकाश कुंटे यांनी कॉफी आणि बंरच काही, & जरा हटके या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.\nझी मराठीवरील आदित्य- मेघनाच्या प्रेमाने ओसंडून वाहणारी व जोडीला देसाई वाडी आणि खुमासदार परिवाराची ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेने प्रेक्षकांचे खरोखर मन जिंकले. महाराष्ट्राच्या घराघरांत आदित्य-मेघनाच्या प्रेमाचे गोडवे देखील गायला सुरूवात झाली होती.\nआता एका नव्या माध्यमातून आदित्य-मेघना उर्फ प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर ही जोडी पुन्हा पाहायला मिळणार ही बातमी जर खरी असली तर प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा होईल...\nतुम्हाला हे वाचायला आवडेल \n‘चला हवा येऊ द्या’ का घेतायेत विश्रांती...\n'गच्ची' वर झाला होता गंभीर अपघात\nहि मराठी अभिनेत्री लवकरच करतेय लग्न...\nअमृताला कोणी लिहिल पत्र...\nबघा शनायाने आयुष्यात पहिल्यांदा काय घेतला विकत\nसुबोध भावे करणार प्राजक्ता माळीसोबत स्क्रिन शेअर\n‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित मराठी चित्रपटाची निर्मिती करणार\n लाफ्टर क्वीन प्राजक्ता हनमघरचे झाले शुभमंगल\nइरफान खान आणि डलक्यूअर सलमान यांच्यासोबत झळकणार मिथिला पालकर\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation फुलले फुलवाचे सुंदर स्वप्न पूर्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mahabhatkanti.com/maharashtra/destinations", "date_download": "2018-08-18T08:29:13Z", "digest": "sha1:SKMTSZQCD3M6O42SONNVY4EBFK6TQ54H", "length": 39260, "nlines": 186, "source_domain": "www.mahabhatkanti.com", "title": "Places to Visit in Maharashtra - Mahabhatkanti", "raw_content": "\nशक्तीशाली राजवटींचे केंद्र असणारा शक्तीशाली किल्ला\nऔरंगाबाद म्हटलं की लोकांना अजंठा, वेरूळची लेणी आठवतात. औरंगाबादमध्ये या लेण्यांशिवाय बघण्याकरिता अजूनही काही पर्यटनस्थळे आहेत. त्यातील सर्वात प्रामुख्याने नाव घेता येईल ते ठीकाण म्हणजे देवगिरी किंवा दौलताबादचा किल्ला. दगडांमधून तयार केलेले रस्ते आणि गुहा, मंदिरं, खंदक, संरक्षक तटबंद्या, मोटी, शाही महल आणि हम्मामखाने, निवासी घरे, बाजार, विहीरी आणि टाके याने परिपुर्ण असा किल्ला म्हणजे दौलताबादचा किल्ला.\nअनेक राजवटी बघणारा विदर्भातील ऐतिहासिक किल्ला\nडोंगराळ किल्ला आणि बरोबरीला सभोवतीला वन्यजीव असं दृष्य महाराष्ट्रात फारच कमी ठीकाणी दिसतं. नरनाळा किल्ला हा अशाच दुर्मिळ कॉम्बिनेशनचा एक हिस्सा आहे. मेळघाट प्रकल्प आणि त्याच्या मध्ये पुरातत्व विभागाची संरक्षित वास्तू असणार भव्य आणि कठीण असा नरनाळा किल्ला हे एक प्रसिद्ध पर्यटनक्षेत्र बनलं नसेल तर नवल.\nशंभो शंकराचे वास्तव्य असणारे सुंदर बीच\nमहाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी पासून सुमारे 70 की.मी. अंतरावर वेळणेश्वर (Velaneshwar) आहे. अत्यंत सुंदर मऊशार वाळूचा समुद्रकिनारा, सोबत वेळणेश्वर शिवशंभोचे मंदिर या परिसरास खऱ्या अर्थाने शोभा आणतात. सर्व जगापासून लांब एकांतात जावे आणि एक शांत आयुष्य जगावे वाटले की भेट द्यावी असे हे ठिकाण....\nमुरूड जंजिऱ्याला आव्हान देणारा किल्ला\nकिल्ले पद्मदुर्ग हा स्थानिकांना कासा किल्ला या नावाने माहित आहे. समुद्रामध्ये असणारे जे मोजके 5-6 किल्ले आहेत त्यापैकी एक पद्मदुर्ग. मुरूडमधील सिद्दींच्या मुरूड जंजीऱ्याला शह देण्यासाठी आणि सिद्दींवर आपला वचक रहावा यासाठी हा किल्ला बांधण्यात आला.\nदशभुजा गणेशाचे प्राचीन मंदिर\nधार्मिक स्थळे | रत्नागिरी\nरत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुहागरपासून साधारणतः 30 कि.मी. अंतरावर हेदवी (Hedvi) गाव आहे. या ठिकाणी दशभुजा गणपतीचे मंदिर प्राचीन देवस्थानांपैकी एक मानले जाते. साधारणपणे 3 फुट उंचीची बसलेल्या स्वरुपातील गणेश मुर्ती ही देखील वैशिष्ट्यपुर्ण आहे.\nजागतिक वारसा असणारे निसर्गरम्य ठिकाण\nनिसर्ग सौदर्य | सातारा\nसातारा शहरापासून सुमारे 22 कि.मी. अंतरावर असणारे कास पठार (Kas Plateau) सह्याद्रीच्या पश्चिम घाटाच्या डोंगररांगामध्ये असणारे मोठे पठार आहे. युनेस्को च्या जागतिक वारसा हक्क ठिकाणांमधील एक असणारे कास पठार जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत फुलणाऱ्या सुमारे 850 प्रकारच्या वेगवेगळ्या फुलांनी बहरून जाते आणि हा रंगेबिरंगी गालिचा बघण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रातील पर्यटकांची एकच झुंबड उडते. हा फुलणारा गालिचा हेच या पठाराचे वैशिष्ट्य आहे.\nभाविकांचे श्रद्धास्थान असणारे प्रती बालाजी मंदिर\nधार्मिक स्थळे | पुणे\nमुंबई - बेंगळुरू महामार्गावर पुण्यापासून सुमारे 45 कि.मी. अंतरावर केतकावळे (Ketkawale) येथे प्रती बालाजी मंदिर (Balaji) प्रसिद्ध आहे. तिरूपती येथील बालाजी मंदिराची प्रतिकृती असणारे मंदिर आणि येथून जवळच असणारे नारायणपूर येथील एकमुखी दत्त मंदिर, तसेच बनेश्वर ही तीन ठिकाणे आपण एकाच दिवसात करू शकता.\nगिरीजात्मक गजाननाचे गुहेतील मंदिर\nधार्मिक स्थळे | पुणे\nपुणे जिल्ह्यात 90 कि.मी. अंतरावर जुन्नर येथील लेण्याद्री (Lenyadri) येथे गिरीजात्मक गणेश स्थापन आहे. सुमारे 18 बौद्धकालीन लेणी असणाऱ्या या ठिकाणी आठव्या लेण्यामध्ये गिरीजात्मक गणेश वसलेला आहे. पार्वतीने आपल्या पोटी गजाननाने जन्माला यावे यासाठी त्याची तपश्र्चर्या केली असे सांगितले जाते. अष्टविनायकांमधील सहावा गणपती म्हणजे लेण्याद्रीचा गिरिजात्मक. या गणेशाला भेट देण्यासाठी आपल्याला उंच उंच अशा 300 पायऱ्या चढून जावे लागते.\nपुणे - मुंबई जवळचा बेस्ट वीकेंड स्पॉट\nपुण्यापासून सुमारे 70 कि.मी. अंतरावर लोणावळा (Lonavala) हे थंड हवेचे ठिकाण वसलेले आहे. मुंबई आणि पुणे येथून केवळ दोन तासांच्या अंतरावर असल्याने हे लोकप्रिय वीकेंड स्पॉट झाला आहे. पावसाळ्यामध्ये येथे वाहणारे धबधबे, भरलेले भुशी धरण आणि येथे होणारे रॅपलिंग सारखे थरारक खेळ यामुळे हा परिसर गजबजून जातो.\nगृत्समद ऋषींनी स्थापन केलेला वरदविनायक\nधार्मिक स्थळे | रायगड\nमहाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी प्रसिद्ध असणाऱ्या वरदविनायकाचे मंदिर महड (Mahad) या गावामध्ये आहे. पुराणातील एका कथेनुसार गृत्समद ऋषींनी गणपतीची उपासना केली आणि त्यानंतर गणेशाची स्थापना केली, तोच हा प्रसिद्ध वरदविनायक. 1690 मध्ये जवळच्या तलावात सापडलेल्या या मुर्तीचे देऊळ 1725 च्या आसपास बांधण्यात आले.\nधार्मिक स्थळे | पुणे\nअष्टविनायकांमधील पहिला गणपती असणारा मोरगाव (Morgaon) येथील गणपती मयुरेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. मोरेश्वर मंदिर नावाने प्रसिद्ध असणारे हे गणपती मंदिर पुणे शहरापासून 80 कि.मी. अंतरावर बारामती तालूक्यात वसलेले आहे. अष्टविनायक यात्रा या गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय पुर्ण होत नाही अशी भाविकांची श्रद्धा आहे.\nभाविकांची विघ्ने दुर करणारा विघ्नहर गणपती\nधार्मिक स्थळे | पुणे\nपुणे नाशिक महामार्गावर पुण्यापासून सुमारे 85 कि.मी. अंतरावर नारायणगावाजवळ ओझरचे (Ozar) विघ्नहर गणपतीचे मंदिर आहे. अष्टविनायकातील एक असणाऱ्या या गजाननाला पुजल्याने भाविकांचे सर्व विघ्न दुर होतात असे सांगितले जाते. चिमाजी अप्पांनी वसईचे युद्ध जिंकल्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा तसेच सोन्याचा कळस अर्पण केल्याचा उल्लेख आहे.\nबल्लाळेश्वर गणेशाचे प्राचिन मंदिर\nधार्मिक स्थळे | रायगड\nरायगड जिल्ह्यातील कर्जतपासून 30 कि.मी. अंतरावर पाली (Pali) गावामध्ये बल्लाळेश्वर (Ballaleshwar) गणपतीचे मंदिर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक असणारे हे मंदिर सरसगड आणि अंबा नदी यांच्यामध्ये वसलेले आहे. 1640 मध्ये बांधण्यात आलेले मुळच्या लाकडी मंदिराचा हे 1760 साली दगडी बांधकाम करून जीर्णोद्धार करण्यात आला.\nशैक्षणिक संस्थांसाठी प्रसिद्ध असे थंड हवेचं ठिकाण\nपाचगणी (Panchagani) हे सातारा जिल्ह्यामधील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आहे. पाचगणीची दुसरी ओळख म्हणजे येथे असणाऱ्या विविध शैक्षणिक संस्था. ब्रिटीश काळामध्ये जी विविध थंड हवेची ठिकाणे शोधून काढण्यात आली त्यापैकी पाचगणी एक आहे. साताऱ्यापासून 48 किं.मी अलिकडे असणारे पाचगणी पुण्यापासून फक्त 102 कि.मी. अंतरावर आहे.\nपुणे शहराच्या मध्यभागात असणारा शनिवारवाडा (Shaniwarwada) हा पेशव्यांचे निवासस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. थोरल्या बाजीरावांनी 1730 मध्ये या वाड्याचं काम सुरू केले आणि 1732 च्या आसपास याचे बांधकाम पुर्ण झाले. एकेकाळी आपल्या सातमजली इमारती साठी प्रसिद्ध असणाऱ्या या शनिवार वाड्यामध्ये आता उरलेत ते केवळ मजबूत तटबंदी, प्रवेश करण्याचे दरवाजे आणि आतील इमारतींचे वैभव दर्शवणारे जोते.\nश्री विष्णूने स्थापलेला प्राचीन गणपती\nधार्मिक स्थळे | अहमदनगर\nमहाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक असणारा सिद्धीविनायक हा अहमदनगर येथील सिद्धटेक (Siddhatek) येथे वसलेला आहे. अष्टविनायकांमध्ये उजव्या सोंडेचा असणारा हा एकमेव गणपती आहे. प्राचीन कथेप्रमाणे श्रीविष्णूने मधु व कैटभ राक्षसांना मारण्यापुर्वी या गणेशाची स्थापना करून त्याची आराधना केली होती.\nपेशव्यांचे श्रद्धास्थान असणारे चिंतामणी गणेश मंदिर\nधार्मिक स्थळे | पुणे\nपुणे - सोलापूर रस्त्यावर पुण्यापासून साधारण तीस कि.मी. अंतरावर थेऊर (Theur) गाव आहे. महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या अष्टविनायकांपैकी एक असणाऱ्या चिंतामणी (Chintamani) गणेशाचे मंदिर या थेऊर गावी आहे. सर्व चिंता दुर करणारा तो चिंतामणी. पेशव्याचे विशेषतः माधवराव पेशव्यांचे श्रद्धास्थान म्हणून या मंदिराचा खास उल्लेख करावा लागेल.\nवर्धा जिल्ह्यातील एक सर्वोत्तम जागा\nवर्धा जिल्ह्यामधील हिंगणी गावाजवळ बोर अभयारण्य (Bor Wildlife Sanctuary) वसले आहे. वर्ध्यापासून हिंगणी साधारणतः 35 कि.मी. अंतरावर आहे. सुमारे ६१ चौरस कि.मी. एवढ्या भागामध्ये हे अभयारण्य आहे.\n500 वर्षे जुना एतिहासिक किल्ला\nअहमदनगर शहरापासून सुमारे 1 कि.मी. अंतरावर वसलेला आणि पाचशे वर्षाचा असणारा अहमदनगरचा किल्ला हा नगर जिल्ह्यातील एक प्रमुख आकर्षण आहे. स्वातंत्र्यपुर्व काळामध्ये पंडित नेहरू यांना येथे स्थानबद्ध करण्यात आले होते आणि आपला 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हे पुस्तक त्यांनी याच किल्ल्यामध्ये लिहीले.\nसत्यसाईंनी बांधलेले पांडुरंग क्षेत्र\nधार्मिक स्थळे | पुणे\nपुण्यापासून सुमारे 40 कि.मी. अंतरावर पिरंगुटजवळ हडशी (Hadshi) नावाचे गाव आहे. या गावामध्येच सुमारे 300 एकर जागेवर श्री सत्य साई बाबांकडून पांडुरंगाचे मंदिर बांधण्यात आलेले आहे. अत्यंत निसर्गरम्य आणि चहुबाजुंनी डोंगरांनी वेढलेल्या परिसरात वसवलेल्या या क्षेत्रामध्ये प्रवेश करताच मन अतिशय प्रसन्न होते.\nएकदिवसीय ट्रीपसाठीचे सर्वात पॉप्युलर ठिकाण\nरायगड जिल्ह्यात असणारे अलिबाग (Alibaug) पुणे तसेच मुंबईच्या पर्यटकांचे एकदिवसीय ट्रीपसाठी आवडते बीच म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे आणि मुंबईपासून जवळ असल्यामुळे केवळ 3-4 तासात पोहोचण्याचे नियोजन करता येते. आणि त्याचमुळे पर्यटक झटपट ट्रीपसाठी या ठिकाणास पहिली पसंती देतात.\nनरवीर तानाजीच्या पराक्रमाचा जागता साक्षीदार\nट्रेकींगसाठी पुण्याच्या जवळपास कोणतं ठिकाण आहे असं पुण्यात कोणाला विचारलं तर किल्ले सिंहगड (Sinhagad Fort) हे नाव कोणीही सहज सांगेल. पुण्यापासून ३० कि.मी. अंतरावर असणारा एकेकाळी कोंढाणा नावाने माहित असणारा हा किल्ला नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने अजरामर झाला आणि सिंहगड नावाने ओळखला जाऊ लागला.\nसाताऱ्याजवळील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण\nमहाबळेश्वर (Mahabaleshwar) हे सातारा जिल्ह्यातील छोटे शहर असून महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध असे थंड हवेचे ठिकाण आहे. पश्चिम घाटांमध्ये वसलेले हे ठिकाण ब्रिटीशांनी आपली उन्हाळ्यातील राजधानी म्हणून निवडलेले होते.\nछत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी\nरायगड जिल्ह्यात महाडजवळ सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वतरांगात वसलेला किल्ला म्हणजे रायगड (Raigad). ट्रेकर्स, पर्यटक या सर्वांकरिताच नव्हे तर तमाम महाराष्ट्रातील जनतेला रायगडबद्दल एक वेगळाच आदर आहे. त्याचे कारण म्हणजे स्वराज्याचे संस्थापक आणि संपुर्ण महाराष्ट्राचे दैवस्वरूप शिवाजी महाराजांची राजधानी रायगड किल्ला होता. महाराजांच्या राज्याभिषेकापासून ते महाराजांच्या अंतिम काळापर्यंत राजांनी याच किल्ल्यावरून राज्य चालवले.\nधार्मिक स्थळे | पुणे\nपुणे जिल्ह्यामध्ये अनेक देवस्थाने वसलेली आहेत. यामध्ये बरिचशी शंकराची देवस्थाने असून ती ठिकठिकाणी विखुरलेली आहेत. प्राचीन देवस्थाने असुनही सुस्थितीत आणि फारशी माहित नसणारी जी ठिकाणे आहेत त्यापैकी एक म्हणजे पांडेश्वर (Pandeshwar) येथील महादेवाचे मंदिर.\nदापोली जवळील शांत आणि आनंददायक समुद्रकिनारा\nरत्नागिरी जिल्ह्यात दापोली शहरापासून सुमारे 11 कि.मी. अंतरावर असणारे मुरूड हे छोटेसे गाव आपल्या लांबलचक, शांत आणि चमकणाऱया मऊ रेतीच्या समुद्रकिनाऱयामुळे प्रसिद्ध आहे. प्राचीन देवीचं मंदीर, हवेत हेलकावे घेणारी पोफळीची झाडे आणि समोर पसरलेला शांत, अथांग समुद्र ही मुरूडच्या बीचची खास वैशिष्ये म्हणता येतील.\nपुराणकालीन संदर्भ असणारा अष्टविनायकांमधील महागणपती\nधार्मिक स्थळे | पुणे\nपुण्यापासून 50 कि.मी. अंतरावर असणाऱया शिरूर तालुक्यात असणारे रांजणगाव अष्टविनायकांमधील महागणपतीसाठी प्रसिद्ध आहे. या गणपतीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या गावामध्ये गणेशोत्सवाच्या काळात घरामध्ये गणपतीची स्थापना करत नाहीत. या मंदिराच्या इतिहासानुसार हे मंदिर नवव्या किंवा दहाव्या शतकात बांधले गेलेले आहे.\n300 वर्षापेक्षा जास्त काळ समुद्राच्या रौद्र लाटांनाही न मानणारा अभेद्य किल्ला\nभर समुद्रात रौद्र लाटांना तोंड देत उभा असणारा एक अद्वितीय आणि एकमेव अजिंक्य राहिलेला किल्ला म्हणजे मुरूड जंजीरा. रायगड जिल्ह्यात मुरूड गावाजवळ समुद्रात असणारा हा किल्ला पुणे आणि मुंबई पासून साधारण १८० कि.मी. अंतरावर आहे.\nचमचमणाऱया वाळूने सजलेला सुंदर समुद्रकिनारा\nअलिबाग – मुरूड रस्त्यावर वसलेले काशिद हे अलिबाग पासून 30 कि.मी. अंतरावर असून आपल्या निळाशार किनारा, चमचमणारी पांढरी वाळू आणि आजुबाजूला असणाऱया निसर्गासाठी प्रसिद्ध आहे.\nछत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान\nपुणे शहराच्या उत्तरेला सुमारे 85 कि.मी. अंतरावर जुन्नर तालुक्यामध्ये असणारय़ा शिवनेरी किल्ल्याला रायगडाप्रमाणेच मानाचे स्थान आहे. आपल्या महाराष्ट्राचा इतिहासच ज्यांच्याशिवाय सुरू होऊ शकत नाही त्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी या किल्ल्यावर झाला.\nशिल्पकलेचा अद्भूत प्राचिन वारसा\nऐतिहासिक स्थळे | पुणे\nभारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रात वैविध्यपुर्ण अशा लेणी आहेत. अतिप्राचीन संपुर्ण पहाडात कोरलेली ही लेणी बघताना त्यावेळेच्या शिल्पकलेस आणि आर्किटेक्चरला दाद द्यावीशी वाटते.\nसर्वात लांब आणि सुंदर समुद्रकिनारा लाभलेलं ठिकाण\nचिपळूणपासून चाळीस किलोमीटर अंतरावर वसिष्ठी नदी आणि जयगड खाडीच्यामध्ये गुहागर वसलंय. एकेकाळी फारसं कोणाला माहित नसलेलं गुहागर आता कोकणातलं एक popular destination बनत आहे.\nश्रीवर्धन जवळचे एक शांत आणि सुंदर बीच\nरायगड जिल्ह्यामध्ये श्रीवर्धन तालुक्यामध्ये असणारे दिवेआगर (Diveagar) हे सुवर्ण गणेश मंदिर आणि शांत व सुंदर बीचसाठी प्रसिद्ध आहे. अलिकडच्या काळात वीकेंड आणि सुटीच्या दिवसांमध्ये गर्दी होणारे बीच अशी दिवेआगरची ओळख आहे.\nकुटुंबासहीत सुट्टी साजरी करण्याचे उत्तम ठिकाण\nरायगड जिल्ह्यात वसलेले श्रीवर्धन हे पर्यटकांच्या सर्वाधिक आवडीच्या काही ठिकाणांपैकी एक आहे. श्रीवर्धनमध्ये आणि त्याच्या आजूबाजूला भरपूर समुद्रकिनारे आहेत.\nपुणे - मुंबईमधील ट्रेकर्सना जवळपासचा सर्वात उत्तम ट्रेक कोणता असा प्रश्न विचारला तर एकच उत्तर येईल - हरिश्र्चंद्रगड (Harishchandragad). अहमदनगर जिल्ह्यामध्ये असणारे हे प्राचीन ठिकाण ट्रेकर्सना नेहमीच खुणावत असते. ठाणे, अहमदनगर आणि पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमारेषेवर असणारा हरिश्र्चंद्रगड आणि त्याच्या आजुबाजूला असणारी इतर भटकंतीची ठिकाणे ही पर्यटकांसाठी मेजवानीच आहे.\nभाविकांचं श्रद्धास्थान असणारे वाईतील गणेश मंदिर\nधार्मिक स्थळे | सातारा\n'दक्षिण काशी'' अशी ओळख असणारे वाई मंदिरांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. पुण्यापासून 95 कि.मी. अंतरावर असणारे वाई शहर सातारा जिल्ह्यात वसलेले असून सातारा शहराच्या उत्तरेला 35 कि.मी. अंतरावर आहे.\nपुणे येथील यवतजवळील प्राचिन आणि शांत असे महादेवाचे पांडवकालीन मंदिर\nधार्मिक स्थळे | पुणे\nपुणे जिल्ह्यामध्ये प्राचिन आणि ऐतिहासिक अशी बरीच धार्मिक स्थळे आहेत. अशाच प्राचिन धार्मिक स्थळांपैकी एक स्थळ म्हणजे भूलेश्वर देवस्थान. पुण्यापासून केवळ 50 कि.मी. अंतरावर पुणे-सोलापूर महामार्गावर यवतजवळ हे महादेवाचे देवस्थान आहे. एका डोंगरावर वसलेले हे मंदिर पांडवकालीन असून शांत आणि धीरगंभीर वातावरणामुळे आपले येथे जाणे एक सुखकर अनुभव ठरतो.\nमहादेवाचे मंदिर आणि निसर्गरम्य समुद्रकिनाऱयाचा आनंद\nधार्मिक स्थळे | रायगड\nरायगड जिल्ह्याच्या दक्षिणेला असणारे हरिहरेश्वर येथे असणारे महादेवाचे मंदीर भाविकांचे विशेष श्रद्धास्थान हे म्हसाळ्यापासून दिवेआगर, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर हे तीन फाटे फुटतात. या फाट्यापासून साधारण १६ कि.मी. अंतरावर हरिहरेश्वर आहे.\nबनामध्ये वसलेल्या महादेवाचं शांत आणि सुंदर मंदिर\nधार्मिक स्थळे | पुणे\nपुणे - सातारा महामार्गावर पुण्यापासून 35 कि.मी. अंतरावर नसरापूर येथे बनेश्वर येथे शंकराचे मंदिर आहे. शांत आणि निसर्गरम्य अशा वातावरणात वसलेले हे मंदिर अत्यंत साधे आणि तरिही सुंदर आहे. जंगल म्हणजे बन आणि या बनामध्ये वसलेला ईश्वर म्हणजे बनेश्वर.\n४०० वर्षे जुने गणपतीचे स्वयंभू मंदीर आणि सोनेरी वाळूचा समुद्रकिनारा\nगणपतीपुळे (Ganpatipule) हे शांत, निसर्गसंपन्न आणि मानवी अतिक्रमणापासून (अद्यापतरी) दुर असणारं ठिकाण आहे. नैसर्गिक समुद्रकिनारा आणि आठवणीत ठेवावा अशा मार्गाने प्रवास आपली सहल अविस्मरणीय करते. लाल मातीत वसलेली छोटी छोटी खेडी, रस्त्याच्या दुतर्फा असणारी हिरवीगर्द झाडी, आणि सुखाचा प्रवास करवणारे रस्ते, आजुबाजुचे वातावरण पवित्र आणि प्रसन्न करणारे गणेश मंदीर आणि समोर पसरलेला सोनेरी वाळूतला समुद्र, नारळी पोफळीच्या बागा… आणि कोकणातली साधी माणसं… गणपतीपुळे खऱया अर्थाने आपल्याला घराजवळ असणारा अनुभव देतो.\nसिंहगड रस्ता, पुणे 411030\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://swarnim-sakhi.blogspot.com/2011/07/blog-post_19.html", "date_download": "2018-08-18T08:17:33Z", "digest": "sha1:JFQEN4OQE726AOJWBWBGSBUW52N52IWR", "length": 12594, "nlines": 144, "source_domain": "swarnim-sakhi.blogspot.com", "title": "Swarnim Sakhi...: कविता", "raw_content": "\nआरसे महालात अवचित डोकवावे ..अन चहूदिशांनी आपल्या प्रतिमा सामोऱ्या याव्या .. साऱ्या अक्षरातून आपलेच हुंकार जाणवावेत.. अन कडव्या कडव्यातून आपल्याच जगण्याचे प्रतिबिंब दिसावे तसेच काहीसे कवितांचे उमगणे...\nकवी \"ग्रेस\" यांच्या सारख्यांच्या कविता म्हणजे तर पाण्यावर सोडून दिलेले चिमुकल्या ज्योतींचे दिवेच जणू...\nलाटेवर वाहतील ... वाऱ्यासह त्याच्याच दिशेला पांगतील ...\nजे ओंजळ पसरतील, त्यांच्या हातीसुद्धा लागतील..\nमग त्या दिव्यांनी तुमच्या मनातील अंध:कार दूर होवो ..\nकिंवा मग भरून आलेल्या भावनांच्या कोठाराला आग लागो ..\nसारे सारे त्या ओंजळ पसरणाऱ्या व्यक्तीचे ...\nअश्याच एका कवितेच्या समजण्याचा ... अहं ... कळण्याचा ... नाहीच,,, उमगण्याचा प्रवास ..\nया हृदयीचे त्या हृदयी असाच ,... एवढाच ..\nबाकी शब्द कवीचे... जाणीवा ज्याच्या त्याच्या ..\nअनुभव ज्याचे त्याचे .. अन प्रत्यय तो हि ज्याचा त्याचा ...\nअसाच एक प्रत्यय .. अलवार जुईच्या हिंदकळण्याचा ...\nकवी \"ग्रेस\" यांची कविता ..\nथांब. उसळू नकोस लगेच अशी या नकारावर\nशांतपणे ऐक. दातातून सोड्वून घे ओठ.\nकिती घट्टपणे बोटे गुंतवितेस किती गुन्तवलेस स्वत:ला या प्रेमाच्या पाशात् \nकिती आवेगाने धरून ठेवलेस हे प्रीतीचे बन्ध\nया पहाडाची एकट एकट बेटे काय सहज झाली असतील\nपहाडा सारखा सतत तुझ्या सोबत असण्याचा... अचल अविचल असण्याचा ध्यास मोडून हे विखरून पडणे आलेय नशिबात.. हे विलग होणे जीवघेणेच ....\nपरक्यासाठी रडू यावे तसे काय समुद्र सहज जमले असतील हृदय पिळवटून निघावे तसे हे अश्रुंचे समुद्र उगीच का झालेत...\nगुलाब वाळायला लागले की बेटांचा जीव जागेवर नसतो पोरी,..\nदिलेल्या शपथा..घेतलेल्या आणाभाका... चोरून दिले घेतलेले अन मनात अजून ताजे असणारे गुलाब या अश्या परिस्थितीच्या झळांनी वाळायला लागले की ते छिन्न विच्छिन्न हृदय जागेवर कसे राहील... \nस्वैर रसस्वाद: भक्ती आजगावकर\nस्वैर रसस्वाद ... भारी (जड जड\nनेणत्या शब्दांची सलगी होण्यास वेळ लागत नाही.. ग्रेसांच्या कवितेचा शोध घेताना अवचितपणे तुह्या या ब्लॉगवरच्या पोस्टवर आलो. ग्रेसांच्या कवितेअगोदर तू दिलेली छोटीशी प्रस्तावना फार आवडली. मोजक्या शब्दांत थेट अर्थ पोहोचवणं अगदी सगळ्यांनाच जमतं असं नाही. तुला ते सहज जमलंय, हे प्रांजळपणे सांगावसं वाटलं म्हणूनच लिहीत आहे.\nमनापासून लिहिणारे आवडतात. लिहीत राहावे, वाचत राहीनच.\n अन इथे सख्य असेल ते जे जे उत्तम उदात्त सुंदर अश्या सारया हृद्य गोष्टींचे .. कविता... लेख... पुस्तक.. फोटो .. रंग ... रेषा... उकार ..वेलांट्या.. जगण्यातल्या चिमुकल्या क्षणांचे .. मनस्वी नात्यांच्या इंद्रधनुषी गोफांचे.. लडीवाळपणे भवती भवती फेर धरणारया आठवणींचे ... अन अंतरी कस्तुरी सारख्या दरवळणारया मैत्रीचे ... किंवा अगदी पायी टोचणारया काट्याचे .. नि पदर ओढत ओरखडे देणाऱ्या निवडुंगाचे सुद्धा .. या सारया गोष्टींचे सख्य आहे.. म्हणून सखी आहे ...\nसांगता येत नाही ...\nरोज की तरह आ गयी वो... रोज की तरह बच्चा देखता रहा अपनी भूरी आँखे भरके... हाथ उठाये ... दिल भरमाये ... रोज की तरह ... फिर एक बार आस लगा...\nपावसात भिजलेले तन मन माझे उगीचच रुसण्याचे बहाणे हे तुझे क्षणार्धात विरतील दुराव्याचे ढग एकदाच परतुनी माझ्याकडे बघ ... ...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ७\nदिवस सातवा हाही दिवस असाच पहाटे उठतो... आधी गणपतीची रूप डोळ्यात रेखून... मग बाकी काम चालू करतो.. सकाळीच पूजा, आरती करून शेजारया...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग 5\nदिवस पाचवा.. हा दिवस गाजवत येतो तयारी हरतालिकेची अन गणपतीची .. सुरु होतो तोच वाजत गाजत .. पुन्हा एकदा वारी बाजाराची... तयारी हरतालिकेच...\nA Walk In Cloud.... गत वर्षीची कोजागिरी अशी जगजीत सिंगजींच्या गझलेत चिंब भिजलेली होती... \"हाथ छुटे भी तो रिश्ते नाही तोडा करते\" ...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ३\nदिवस तिसरा हा दिवस शुभ्र सकाळचा... किलबिल पक्ष्यांच्या आवाजाने जागा होणारा... शेजारच्या गोठ्यातल्या गाईच्या घुंगुरवाळा आवाजाचा... ...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ४\nदिवस चौथा हा दिवस तसा आरामाचा... सुशेगात उठण्याचा... कामाची घाई विसरून चहा पार्टी करण्याचा.. तळ्याच्या काठावर बसून शांत...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ६\nदिवस सहावा... अन मग हा उत्सवी दिवस उजाडतो भल्या पहाटेच... मूर्ती स्थानापन्न होते सजवलेल्या माटीच्या मखरात...मागे रंगवलेले चित्र आत...\nपदर ... नक्षीदार पदर ... रेशमी साडीचा...बुट्टीदार काठाचा .. जरतारीच्या मोराचा वयात येताना आपसूकच चापून-चोपून खांद्यावर विसावलेला... सौभ...\nहृद्य वाचकगण - Followers\nकविता (27) तुमचे सुद्धा होते का असेच (14) सखी (10) मैं (9) भक्ती (3) गोकुळ (2) होकार (2) निळा शाम (1) निळाई (1) भूल (1)\nशेअर विथ केअर :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/dhing-tang-26361", "date_download": "2018-08-18T08:32:17Z", "digest": "sha1:EOUXMFAQ3KAXLKGFJFZLILGGA7SVB5BV", "length": 17913, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "dhing tang चरखा! (ढिंग टांग) | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 17 जानेवारी 2017\n‘साधी राहाणी आणि उच्च विचारसरणी’ ह्या उक्‍तीचे जिवंत उदाहरण पाहावयाचे असेल, तर मजकुरासोबत (हरहमेश) येणारे आमचे चित्र पाहून ठेवावे. आमची दिनचर्या ऐकलीत, तर असा माणूस होणे नाही, असेच तुम्ही म्हणाल कां की नेमस्त आहार, नेमस्त विहार, आणि नेमस्त विचार ह्यांचा अंगीकार करून गेली कैक वर्षे आम्ही नेमस्त व्रतस्थ जीवन कंठीत आहो कां की नेमस्त आहार, नेमस्त विहार, आणि नेमस्त विचार ह्यांचा अंगीकार करून गेली कैक वर्षे आम्ही नेमस्त व्रतस्थ जीवन कंठीत आहो नव्या युगातील सर्वांत साधा मनुष्य म्हणून आमची ख्याती सर्वदूर पोचत असताना खादीच्या क्‍यालिंडरावर भलभलते मॉडेल लोक दिसू लागल्याने आम्ही मनातून मॉडून पडलो आहो नव्या युगातील सर्वांत साधा मनुष्य म्हणून आमची ख्याती सर्वदूर पोचत असताना खादीच्या क्‍यालिंडरावर भलभलते मॉडेल लोक दिसू लागल्याने आम्ही मनातून मॉडून पडलो आहो अहह काय ही मूल्यांची पायमल्ली किती ही मूल्यांची विटंबना\n‘साधी राहाणी आणि उच्च विचारसरणी’ ह्या उक्‍तीचे जिवंत उदाहरण पाहावयाचे असेल, तर मजकुरासोबत (हरहमेश) येणारे आमचे चित्र पाहून ठेवावे. आमची दिनचर्या ऐकलीत, तर असा माणूस होणे नाही, असेच तुम्ही म्हणाल कां की नेमस्त आहार, नेमस्त विहार, आणि नेमस्त विचार ह्यांचा अंगीकार करून गेली कैक वर्षे आम्ही नेमस्त व्रतस्थ जीवन कंठीत आहो कां की नेमस्त आहार, नेमस्त विहार, आणि नेमस्त विचार ह्यांचा अंगीकार करून गेली कैक वर्षे आम्ही नेमस्त व्रतस्थ जीवन कंठीत आहो नव्या युगातील सर्वांत साधा मनुष्य म्हणून आमची ख्याती सर्वदूर पोचत असताना खादीच्या क्‍यालिंडरावर भलभलते मॉडेल लोक दिसू लागल्याने आम्ही मनातून मॉडून पडलो आहो नव्या युगातील सर्वांत साधा मनुष्य म्हणून आमची ख्याती सर्वदूर पोचत असताना खादीच्या क्‍यालिंडरावर भलभलते मॉडेल लोक दिसू लागल्याने आम्ही मनातून मॉडून पडलो आहो अहह काय ही मूल्यांची पायमल्ली किती ही मूल्यांची विटंबना\nअन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मानवाच्या तीन मूलभूत गरजा आहेत. पैकी वसुधैव कुटुंबकम हे सुभाषित तोंडपाठ असल्याने आम्ही निवाऱ्याचा प्रश्‍न सोडवला आहे. वस्त्राचे म्हणाल तर आम्ही ते पेहनावेच, असे जनमत दिसून येत्ये. अन्नाचा प्रश्‍न मात्र आम्ही पोटतिडिकेने सोडवीत असतो.\n...सकाळी पाच- सहा खजूर आणि भरपूर दूध घातलेला चहा असे माफक सेवन झाल्यावर आम्ही पोहे, शिरा, उपमा, साबुदाणा खिचडी किंवा ह्यापैकी कुठलाही एक पदार्थ न्याहरीपोटी ग्रहण करितो. प्रात:समयीचा चहा (खजूर इंक्‍लुडेड) आणि वरील पदार्थांच्या मध्ये एका मारी बिस्कुटाच्या पुड्यापलीकडे मुखात अन्नाचा कण आम्ही घेत नाही. संयम पाळतो. ह्या काळात आम्ही सूत काततो. टकळी हे आमचे शस्त्र आहे\nसूत कातण्याबरोबरच सूत जमविण्याकडेही आमचा थोडका कल असल्याने त्याही दिशेने आमचे अथक प्रयत्न चालू असतात. सूत जमविण्याचे प्रयत्न ही सोपी गोष्ट नव्हे. प्रसंगी कुत्र्यासारखा मारदिखील खावा लागतो. बालपणी ‘शेजाऱ्यांवर प्रेम करा’ अशी शिकवण आम्हाला मिळाल्याने आम्ही हीच बाब वेगळ्या पद्धतीने आमच्या शेजारील बिऱ्हाडातील कु. बेबीनंदा ईच्या कानावर घातली. परिणामी, तिच्या तामसी वृत्तीच्या जन्मदात्याने आम्हाला महिनाभर मांडी घालून बसता येणार नाही, अशी तजवीज केली. आजही थंडीच्या दिवसांत मागील बाजूस दुखरेपण जाणवत्ये व कु. बेबीनंदा ईचे स्मरण होत्ये. असो.\nमित्र जोडावेत, हा संस्कार बालपणापासूनच रुजल्याने मारी बिस्कुटांच्या बदल्यात आम्ही कधीमधी प्रात:समयी मित्रांसमवेत मिसळपावाचा आनंद लुटतो. मिसळपाव हा एकट्याने खावयाचा का पदार्थ आहे तो का कुटुंबासमवेत (धड) खाता येतो तो का कुटुंबासमवेत (धड) खाता येतो तेथे दोस्तदारच हवेत. अर्थात, क्‍वचित प्रसंगी खिमापाव अथवा पायासूप अथवा साधेसे आमलेट (बिगर कांदा) देखील आम्हांस पुरत्ये. खिमा प्याटिस असेल तर आम्ही मिसळपाव निग्रहाने दूर सारून आधी प्याटिस सेवन करितो. मग मिसळपाव तेथे दोस्तदारच हवेत. अर्थात, क्‍वचित प्रसंगी खिमापाव अथवा पायासूप अथवा साधेसे आमलेट (बिगर कांदा) देखील आम्हांस पुरत्ये. खिमा प्याटिस असेल तर आम्ही मिसळपाव निग्रहाने दूर सारून आधी प्याटिस सेवन करितो. मग मिसळपाव एवढे झाल्यावर आम्ही घरी येऊन कुटुंबीयांसमवेत न्याहारी करितो. त्यानंतर मात्र दोपारी माफक असे भोजन होईपर्यंत लंघन करणे श्रेयस्कर असते.\nथोडक्‍यात, आम्ही दिवसभर चरत आणि खात असतो, हे सुज्ञ वाचकांना एव्हापावेतों कळाले असेल दोपारी भोजनोत्तर तीन-चार तास आमचे रिक्‍त पोटानिशीच जात असतात. कां की ह्या काळात आम्ही तीन-चार तासांची एक चिमुकली वामकुक्षी घेतो. पांचेक वाजेपर्यंत नाक्‍यावरील भय्याने कढईत भजी सोडल्याचा वास दर्वळला की आम्ही तटकन उठून बसतो.\nसायंकाळी सातनंतर मात्र आमच्या तळहाताला आपापत: गिलासाचा आकार येऊ लागतो. दोन गल्ल्या सोडून असलेल्या प्रो. विजूअण्णा शेट्टी ह्यांच्या मधुमंदिरात आम्ही नेमस्त पेयपान आणि काही थोडी चणाडाळ, चकली टुकडा, पापड-चटणी असे पदार्थ उष्टावितो. टकळी चालविण्यासाठी विजूअण्णाच्या मधुमंदिराइतकी चांगली जागा दुसरी नसेल.\nटकळी चला चला के आम्ही इतके दिवस रेटले. मध्यंतरी आमच्या काही हितचिंतकांनी सुचविले की, टकळी हे माध्यम आता आपल्यासाठी तोकडे पडत्ये. चरखा ही वस्तू आपल्यासाठी आत्यंतिक उपयुक्‍त आणि अधिक प्रतीकात्मक अशी आहे.\nसतत चरणे आणि खाणे ह्या क्रियांमध्ये अहर्निश बुडालेल्या मनुष्यप्राण्याला ‘चर-खा’च योग्य. परिणामी, आम्ही टकळी सोडून चरखा जवळ केला आहे...\nआता तरी आम्हांस क्‍यालिंडरावर स्थान मिळेल ना\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून सहाजण जखमी\nबेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने बंगळूरकडे जाणारी व्हीआरएलची आराम बस उलटून चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय...\nघरकामगार, बांधकाम मजूर महिलांची उपेक्षाच\nजळगाव : दिवसरात्र काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, पण डोक्‍यावर हक्काचं छत नाही...सतत कष्ट करूनही पदरी काहीच न पडल्यामुळे अनेकदा उपवास...\nवाहून गेलेला तरुण तीस तासांनंतरही सापडेना\nजळगाव ः येथील अयोध्यानगराजवळील नाल्याला काल झालेल्या पावसामुळे पूर आला होता. या पुरात इतर नागरिकांना मदत करणारा तरुण पाय घसरून नाल्यात पडून वाहून...\n13 वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू\nवारजे (पुणे) : महापालिकेच्या पथदिव्याच्या विजेच्या खांबाला धक्का लागून वारजे परिसरातील तेरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mahabhatkanti.com/maharashtra/destinations/religious-places", "date_download": "2018-08-18T08:28:08Z", "digest": "sha1:TVDFSKTF6XELCX457P7CTY66EMR3X3ZH", "length": 17222, "nlines": 115, "source_domain": "www.mahabhatkanti.com", "title": "Religious Places in Maharashtra | Mahabhatkanti", "raw_content": "\nमहाराष्ट्र येथील धार्मिक स्थळे\nदशभुजा गणेशाचे प्राचीन मंदिर\nधार्मिक स्थळे | रत्नागिरी\nरत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुहागरपासून साधारणतः 30 कि.मी. अंतरावर हेदवी (Hedvi) गाव आहे. या ठिकाणी दशभुजा गणपतीचे मंदिर प्राचीन देवस्थानांपैकी एक मानले जाते. साधारणपणे 3 फुट उंचीची बसलेल्या स्वरुपातील गणेश मुर्ती ही देखील वैशिष्ट्यपुर्ण आहे.\nभाविकांचे श्रद्धास्थान असणारे प्रती बालाजी मंदिर\nधार्मिक स्थळे | पुणे\nमुंबई - बेंगळुरू महामार्गावर पुण्यापासून सुमारे 45 कि.मी. अंतरावर केतकावळे (Ketkawale) येथे प्रती बालाजी मंदिर (Balaji) प्रसिद्ध आहे. तिरूपती येथील बालाजी मंदिराची प्रतिकृती असणारे मंदिर आणि येथून जवळच असणारे नारायणपूर येथील एकमुखी दत्त मंदिर, तसेच बनेश्वर ही तीन ठिकाणे आपण एकाच दिवसात करू शकता.\nगिरीजात्मक गजाननाचे गुहेतील मंदिर\nधार्मिक स्थळे | पुणे\nपुणे जिल्ह्यात 90 कि.मी. अंतरावर जुन्नर येथील लेण्याद्री (Lenyadri) येथे गिरीजात्मक गणेश स्थापन आहे. सुमारे 18 बौद्धकालीन लेणी असणाऱ्या या ठिकाणी आठव्या लेण्यामध्ये गिरीजात्मक गणेश वसलेला आहे. पार्वतीने आपल्या पोटी गजाननाने जन्माला यावे यासाठी त्याची तपश्र्चर्या केली असे सांगितले जाते. अष्टविनायकांमधील सहावा गणपती म्हणजे लेण्याद्रीचा गिरिजात्मक. या गणेशाला भेट देण्यासाठी आपल्याला उंच उंच अशा 300 पायऱ्या चढून जावे लागते.\nगृत्समद ऋषींनी स्थापन केलेला वरदविनायक\nधार्मिक स्थळे | रायगड\nमहाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी प्रसिद्ध असणाऱ्या वरदविनायकाचे मंदिर महड (Mahad) या गावामध्ये आहे. पुराणातील एका कथेनुसार गृत्समद ऋषींनी गणपतीची उपासना केली आणि त्यानंतर गणेशाची स्थापना केली, तोच हा प्रसिद्ध वरदविनायक. 1690 मध्ये जवळच्या तलावात सापडलेल्या या मुर्तीचे देऊळ 1725 च्या आसपास बांधण्यात आले.\nधार्मिक स्थळे | पुणे\nअष्टविनायकांमधील पहिला गणपती असणारा मोरगाव (Morgaon) येथील गणपती मयुरेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. मोरेश्वर मंदिर नावाने प्रसिद्ध असणारे हे गणपती मंदिर पुणे शहरापासून 80 कि.मी. अंतरावर बारामती तालूक्यात वसलेले आहे. अष्टविनायक यात्रा या गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय पुर्ण होत नाही अशी भाविकांची श्रद्धा आहे.\nभाविकांची विघ्ने दुर करणारा विघ्नहर गणपती\nधार्मिक स्थळे | पुणे\nपुणे नाशिक महामार्गावर पुण्यापासून सुमारे 85 कि.मी. अंतरावर नारायणगावाजवळ ओझरचे (Ozar) विघ्नहर गणपतीचे मंदिर आहे. अष्टविनायकातील एक असणाऱ्या या गजाननाला पुजल्याने भाविकांचे सर्व विघ्न दुर होतात असे सांगितले जाते. चिमाजी अप्पांनी वसईचे युद्ध जिंकल्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा तसेच सोन्याचा कळस अर्पण केल्याचा उल्लेख आहे.\nबल्लाळेश्वर गणेशाचे प्राचिन मंदिर\nधार्मिक स्थळे | रायगड\nरायगड जिल्ह्यातील कर्जतपासून 30 कि.मी. अंतरावर पाली (Pali) गावामध्ये बल्लाळेश्वर (Ballaleshwar) गणपतीचे मंदिर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक असणारे हे मंदिर सरसगड आणि अंबा नदी यांच्यामध्ये वसलेले आहे. 1640 मध्ये बांधण्यात आलेले मुळच्या लाकडी मंदिराचा हे 1760 साली दगडी बांधकाम करून जीर्णोद्धार करण्यात आला.\nश्री विष्णूने स्थापलेला प्राचीन गणपती\nधार्मिक स्थळे | अहमदनगर\nमहाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक असणारा सिद्धीविनायक हा अहमदनगर येथील सिद्धटेक (Siddhatek) येथे वसलेला आहे. अष्टविनायकांमध्ये उजव्या सोंडेचा असणारा हा एकमेव गणपती आहे. प्राचीन कथेप्रमाणे श्रीविष्णूने मधु व कैटभ राक्षसांना मारण्यापुर्वी या गणेशाची स्थापना करून त्याची आराधना केली होती.\nपेशव्यांचे श्रद्धास्थान असणारे चिंतामणी गणेश मंदिर\nधार्मिक स्थळे | पुणे\nपुणे - सोलापूर रस्त्यावर पुण्यापासून साधारण तीस कि.मी. अंतरावर थेऊर (Theur) गाव आहे. महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या अष्टविनायकांपैकी एक असणाऱ्या चिंतामणी (Chintamani) गणेशाचे मंदिर या थेऊर गावी आहे. सर्व चिंता दुर करणारा तो चिंतामणी. पेशव्याचे विशेषतः माधवराव पेशव्यांचे श्रद्धास्थान म्हणून या मंदिराचा खास उल्लेख करावा लागेल.\nसत्यसाईंनी बांधलेले पांडुरंग क्षेत्र\nधार्मिक स्थळे | पुणे\nपुण्यापासून सुमारे 40 कि.मी. अंतरावर पिरंगुटजवळ हडशी (Hadshi) नावाचे गाव आहे. या गावामध्येच सुमारे 300 एकर जागेवर श्री सत्य साई बाबांकडून पांडुरंगाचे मंदिर बांधण्यात आलेले आहे. अत्यंत निसर्गरम्य आणि चहुबाजुंनी डोंगरांनी वेढलेल्या परिसरात वसवलेल्या या क्षेत्रामध्ये प्रवेश करताच मन अतिशय प्रसन्न होते.\nधार्मिक स्थळे | पुणे\nपुणे जिल्ह्यामध्ये अनेक देवस्थाने वसलेली आहेत. यामध्ये बरिचशी शंकराची देवस्थाने असून ती ठिकठिकाणी विखुरलेली आहेत. प्राचीन देवस्थाने असुनही सुस्थितीत आणि फारशी माहित नसणारी जी ठिकाणे आहेत त्यापैकी एक म्हणजे पांडेश्वर (Pandeshwar) येथील महादेवाचे मंदिर.\nपुराणकालीन संदर्भ असणारा अष्टविनायकांमधील महागणपती\nधार्मिक स्थळे | पुणे\nपुण्यापासून 50 कि.मी. अंतरावर असणाऱया शिरूर तालुक्यात असणारे रांजणगाव अष्टविनायकांमधील महागणपतीसाठी प्रसिद्ध आहे. या गणपतीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या गावामध्ये गणेशोत्सवाच्या काळात घरामध्ये गणपतीची स्थापना करत नाहीत. या मंदिराच्या इतिहासानुसार हे मंदिर नवव्या किंवा दहाव्या शतकात बांधले गेलेले आहे.\nभाविकांचं श्रद्धास्थान असणारे वाईतील गणेश मंदिर\nधार्मिक स्थळे | सातारा\n'दक्षिण काशी'' अशी ओळख असणारे वाई मंदिरांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. पुण्यापासून 95 कि.मी. अंतरावर असणारे वाई शहर सातारा जिल्ह्यात वसलेले असून सातारा शहराच्या उत्तरेला 35 कि.मी. अंतरावर आहे.\nपुणे येथील यवतजवळील प्राचिन आणि शांत असे महादेवाचे पांडवकालीन मंदिर\nधार्मिक स्थळे | पुणे\nपुणे जिल्ह्यामध्ये प्राचिन आणि ऐतिहासिक अशी बरीच धार्मिक स्थळे आहेत. अशाच प्राचिन धार्मिक स्थळांपैकी एक स्थळ म्हणजे भूलेश्वर देवस्थान. पुण्यापासून केवळ 50 कि.मी. अंतरावर पुणे-सोलापूर महामार्गावर यवतजवळ हे महादेवाचे देवस्थान आहे. एका डोंगरावर वसलेले हे मंदिर पांडवकालीन असून शांत आणि धीरगंभीर वातावरणामुळे आपले येथे जाणे एक सुखकर अनुभव ठरतो.\nमहादेवाचे मंदिर आणि निसर्गरम्य समुद्रकिनाऱयाचा आनंद\nधार्मिक स्थळे | रायगड\nरायगड जिल्ह्याच्या दक्षिणेला असणारे हरिहरेश्वर येथे असणारे महादेवाचे मंदीर भाविकांचे विशेष श्रद्धास्थान हे म्हसाळ्यापासून दिवेआगर, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर हे तीन फाटे फुटतात. या फाट्यापासून साधारण १६ कि.मी. अंतरावर हरिहरेश्वर आहे.\nबनामध्ये वसलेल्या महादेवाचं शांत आणि सुंदर मंदिर\nधार्मिक स्थळे | पुणे\nपुणे - सातारा महामार्गावर पुण्यापासून 35 कि.मी. अंतरावर नसरापूर येथे बनेश्वर येथे शंकराचे मंदिर आहे. शांत आणि निसर्गरम्य अशा वातावरणात वसलेले हे मंदिर अत्यंत साधे आणि तरिही सुंदर आहे. जंगल म्हणजे बन आणि या बनामध्ये वसलेला ईश्वर म्हणजे बनेश्वर.\nसिंहगड रस्ता, पुणे 411030\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A0%E0%A4%B3/", "date_download": "2018-08-18T07:59:34Z", "digest": "sha1:LCX7XRJLKR7YGRGLHO655I54SYXRUPAZ", "length": 6461, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मराठा आंदोलनातील काही ठळक मुद्दे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमराठा आंदोलनातील काही ठळक मुद्दे\n* जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी 11 वाजता ठिय्या आंदोलन सुरू\n* मोर्चेकऱ्यांनी दुचाकी रॅली काढली.\n* शहराच्या मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट.\n* चांदणी चौक, वारजे, कात्रज येथे आंदोलकांनी महामार्गावरील वाहतूक रोखली.\n* घोषणाबाजी आणि भजन म्हणत ठिय्या आंदोलन.\n* दुपारनंतर चांदणी चौकातील आंदोलनाला हिंसक वळण; पोलीसांकडून अश्रुधुराचा वापर.\n* उपनगरात ठिकठिकाणी रास्तारोको.\n* शहरातील बाजारपेठा आणि मंडयांमध्ये शुकशुकाट.\n* दुकाने, मॉल, हॉटेल बंद.\n* जिल्हाधिकारी कार्यालयावर तोडफोडीची घटना.\n* रात्री उशीरापर्यंत काही आंदोलकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या.\n* खासगी आस्थापना आणि आयटी कंपन्यांमध्ये घुसून कर्मचाऱ्यांना काम बंद करण्याला भाग पाडले.\n* काही ठिकाणी बॅंकाही बंद करायला लावल्या.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleघटनात्मक वैध आरक्षण तातडीने द्या\nNext articleतिहेरी तलाकविरोधी विधेयकाच्या मंजुरीसाठी मोदी सरकारचा ‘प्लॅॅन बी’ तयार\nपोलीस कर्मचाऱ्याने वाचवले ज्येष्ठाचे प्राण\n“प्रत्येकाच्या मनात सद्भावना असल्यास देशात सहिष्णुता नांदेल’\nसर्व शाळांत राबविणार स्वच्छ भारत पंधरवडा\nसमुपदेशनासाठी नवा उपक्रम “चला बोलूया’\nजिल्ह्यामध्ये “भटक्‍या कुत्र्यांची’ दहशत\nबेरोजगार अभियंत्यांना मिळणार कंत्राटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AA.php", "date_download": "2018-08-18T09:11:14Z", "digest": "sha1:EWXGHSAAKOOU4C2ZCAT4SOS7QV6CT5CC", "length": 98940, "nlines": 1251, "source_domain": "tarunbharat.org", "title": "खाजगी क्लासवाल्यांना चाप बसेल का? | Tarun Bharat", "raw_content": "\nवीर संघवी, ज्येष्ठ पत्रकार\nउजव्या विचारसरणीला एक मंच उपलब्ध होईल म्हणून पुद्दुचेरी साहित्य उत्सव रद्द करण्याची डाव्यांची मागणी विचित्र...\nप्रशांत उमराव, वकील, सर्वोच्च न्यायालय\nमेरठमध्ये हेलिकॉप्टरमधून शिवभक्त कावडियांवर फुलांचा वर्षाव करणारे मेरठ भागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांना...\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळात एकाच दिवशी शंभर बळी\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nआयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ\nअजित वाडेकर यांचे निधन\nकेरळमध्ये पावसाचे ७७ बळी; १८ हजार बेघर\nवीर संघवी, ज्येष्ठ पत्रकार\nAll अर्थ कृषी नागरी न्यायालय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nआयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ\nअजित वाडेकर यांचे निधन\nसीआरपीएफला सर्वाधिक शौर्य पदके\nमहाराष्ट्राला ५१ पोलिस पदके\nहवाई दल जवानाच्या वेषात अतिरेकी\nराजीव गांधींनीच नाकारला होता दलितांचा हक्क\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nरस्ता सुरक्षा विषय अभ्यासक्रमात असावा\nडिजिटल व्यवहारांवर २० टक्के कॅशबॅक\nघर, वाहनकर्ज महागले; व्याजदरात ०.२५ टक्क्यांची वाढ\nमहसूल वाढल्याने जीएसटी घटणार\nनिर्देशांक नव्या विक्रमी उच्चांकावर\n‘डिमांड ड्राफ्ट’च्या नियमात बदल\nडॉलरसमोर रुपया सक्षम, मोदी सरकार धैर्यवान\nदेशभर आज जीएसटी दिवस पाळणार\nआर्थिक सल्लागार भारतीय मूल्ये जोपासणारा असावा\nसरकारी बँकांमध्ये लोकांचा पैसा सुरक्षित\nनागरिकांना प्रामाणिकपणे कर भरण्याची विनंती\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nविदर्भ, मराठवाड्यातील आठ सिंचन प्रकल्पांना केंद्राची मदत\nयंदा ९७ टक्के पाऊस\nहमीभावात दीडपट वाढ होणारच\nशेतीपर्यंत पाणी नेण्याची गरज : नितीन गडकरी\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nआयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ\nअजित वाडेकर यांचे निधन\nसीआरपीएफला सर्वाधिक शौर्य पदके\nमहाराष्ट्राला ५१ पोलिस पदके\nहवाई दल जवानाच्या वेषात अतिरेकी\nराजीव गांधींनीच नाकारला होता दलितांचा हक्क\nरस्ता सुरक्षा विषय अभ्यासक्रमात असावा\nछत्तीसगडचे राज्यपाल बलरामजी दास टंडन यांचे निधन\nउच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र\nआंदोलनात कोट्यवधींची संपत्ती नष्ट होणे भीषणच\nराजीव गांधींच्या मारेकर्‍यांना मुक्त करण्यास केंद्राचा नकार\nबार डान्समध्ये अश्‍लील काय\nनॅशनल हेरॉल्ड प्रकरणी राहुल गांधींना दिलासा नाही\nक्रमांक ३ वरच न्या. जोसेफ यांचा शपथविधी\nजम्मू-काश्मीरच्या कलम ३५-ए वर उद्या सुनावणी\nतीन न्यायमूर्तींची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती\nन्यायाधीशपदी नातेवाईकांच्या नियुक्तीला चाप लागणार\nपीडित बालकांच्या कुठल्याही छायाचित्राला प्रसिद्धी नको\nशबरीमलात महिलांनाही प्रवेशाचा अधिकार\nपंतप्रधान मोदींनी दिल्या इम्रान खान यांना शुभेच्छा\nट्रम्प यांना प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे निमंत्रण\nकाश्मीरची बदनामी करणार्‍या रिपोर्टमागे पाकिस्तानचा हात\nकोरियन द्वीपकल्पातील शांतता प्रक्रियेत भारताचा सहभाग\nभारत घेणार रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली\nसेशेल्समध्ये भारत उभारणार नाविक तळ\nऑगस्टावेस्टलँड : दलालाचे प्रत्यार्पण करण्यास इटलीचा नकार\nराष्ट्रपती तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना\nभारत-ब्रिटनमध्ये होणार प्रत्यार्पण करार\nबांगलादेश परत घेणार आपले ३३ घुसखोर\nइराणवरील बंधनांना भारताचा पाठिंबा नाही\nवाटले नव्हते, ही व्यक्ती पंतप्रधान होईल\nपंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा नाही : शरद पवार\nघुसखोरांचे आदरातिथ्य करायचे का\nएक राष्ट्र, एक निवडणुकीला काँग्रेसचा विरोध\nमोदी सरकारविरुद्ध आंदोलन उभारणार\nअमित शाह महिन्यातून तीन दिवस बंगाल मुक्कामी…\n१७ विरोधी पक्षांना हवी मतपत्रिका\n…तर भारतात रक्ताचे पाट वाहतील\nकाँग्रेसने मान्य केला बोफोर्स घोटाळा\nखटल्याच्या भीतीने राहुल यांचे ते भाषणच काढले\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\nबुलेट ट्रेनसाठी बीईएमएल बनवणार सुटे भाग\n‘बुल’ उधळला: विक्रमी उच्चांकावर विराजमान\nकाँग्रेसच्या भीतीने हादरला होता शेअर बाजार\nभारती एअरटेल, पेमेंट बँकेचा ईकेवायसी परवाना रद्द\nदूरसंचार क्षेत्रात ७५ हजार कर्मचार्‍यांना नारळ\nऐतिहासिक… निर्देशांक ३३ हजारी\nगुंतवणूकदार २५ लाख कोटींनी मालामाल\nरजनीशकुमार स्टेट बँकेचे नवे अध्यक्ष\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nभारतातच तयार होणार सुपर हॉर्नेट\nआयआरएनएसएस-१ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nनेव्हिगेशनल उपग्रहाचे उद्या प्रक्षेपण\n‘जी-सॅट-६ ए’ चे यशस्वी प्रक्षेपण\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nसंरक्षण मंत्रालयाकडून व्यवहार नाही\nसीमेजवळ तैनात होणार चिनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॉकेट\nलष्कराला मिळणार ४०० आधुनिक तोफा\nभीष्म व अजेय रणगाड्यांना स्वदेशी इंजीन\nसीआरपीएफ जवानांना नवे बुलेट प्रूफ जॅकेट\nइसिसचा अतिरेकी अडकला गुप्तचर यंत्रणेच्या जाळ्यात\nसौराष्ट्र सीमेवर पाकची लढाऊ विमाने\nकोणत्याही आव्हानासाठी लष्कर सज्ज\nअग्नी-५ लवकरच लष्कराच्या शस्त्रागारात\nजवानांना १० हजार रुपये कापड भत्ता\nसर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ आला समोर\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nरोहिंग्या निर्वासित नसून, बेकायदेशीर घुसखोरच : किरेन…\n६१,१६४ किमी महामार्गाची कामे सुरू\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान :…\nस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\nनोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन\nपाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात\n२१ हजारांपेक्षा जास्त भारतीयांचे अमेरिकेत अनधिकृत वास्तव्य\nइराणविरोधात अमेरिकेचे एकतर्फी कठोर फेरनिर्बंध\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान :…\nस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\nनिवडणूक नियमाचे उल्लंघन, इम्रान खान यांचा लेखी…\nइम्रान खान यांना खासदारकीची शपथ घ्यायला सशर्त…\n६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू\nअंटार्क्टिकात तुटला अतिविशाल हिमनग\nनोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन\nभारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था\nमल्ल्याची इंग्लंडमधील मालमत्ता जप्त करण्याचे आदेश\nरासायनिक शस्त्रास्त्र वापर बंदीसंबंधित परिषदेला भारताचा पाठिंबा\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nकॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा\nमुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी\nराज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड\nमराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार\nसमृद्धी महामार्गासाठी एकराला ५० लाख रुपये\n‘चाकण पेटवणार्‍या’ पाच हजार जणांवर गुन्हा\nकमी शब्दात व धारदार पोस्ट असावी\nआता घेता येणार वारीचे लाईव्ह दर्शन\nकर्जमाफी कायमस्वरूपी तोडगा नाही : उपराष्ट्रपती\nऔरंगाबादेत पाणीयुद्ध; नळ कापण्यावरून दोन गटात भीषण…\nआता अयोध्येत मंदिर बांधण्यासाठी जाणार\nवंचितांना यमगरवाडी प्रकल्पाने मुख्य प्रवाहात आणले: भैय्याजी…\nनांदेड महानगरपालिकामध्ये कॉंग्रेसची सत्ता\nमुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी\nतुम्ही फक्त चित्रपट दाखवण्याचे काम करा\nसत्ता मिळाली नाही तरी चालेल, पण भाजपा…\nभाजपाने काँग्रेस, राकाँ फोडली असती, म्हणूनच सत्तेत…\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे…\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nगामा पैलवानसह सहा आरोपी अटकेत\nआजपासून फिफा विश्‍वचषकाची जादू\n फुलराणीने दिले २६ वे सुवर्णपदक\nभारताची सुवर्णझळाळी; एकाच दिवशी १७ पदकांची लूट\nतेजस्विनी, अनिश, बजरंगला सुवर्ण\nकुस्तीपटूंना दोन सुवर्णांसह चार पदके\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nशेअर बाजार नव्या शिखरावर\nशेअर बाजाराचा बैल उधळला\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nध्रुपद गायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे निधन\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nतेरा वैभव अमर रहे माँ\nतेरा वैभव अमर रहे माँ\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\n७३ टक्के नागरिकांचा पंतप्रधान मोदींवर विश्‍वास\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\n‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित\nचिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार\nप्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\nअटल, अढळ आणि अमर…\nअटलजी आजचे श्यामाप्रसाद आहेत\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nअटल, अढळ आणि अमर…\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\nअटलजी आजचे श्यामाप्रसाद आहेत\nमेरा परिचय : अटलजींच्या काव्यप्रतिभेतून प्रकटलेले हिंदुसूक्त\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन…\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nराष्ट्रीय एकता दिनानिमित्त ‘एकतेसाठी दौड’\nपरराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज भूतानमध्ये\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची श्री मंजुनाथस्वामी मंदिरात…\nदशम: सौंदर्यलहरी पारायणोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरूत\nनरेंद्र मोदी यांचे नवे मंत्रिमंडळ\nनव्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन्\nश्री गजानन महाराजांची पालखी पंढरपूर वारीहून परतली\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम…\nविधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान\nAll ई-आसमंत ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१२ ऑगस्ट १८ आसमंत\n०५ ऑगस्ट १८ आसमंत\n२९ जुलै १८ आसमंत\n२२ जुलै १८ आसमंत\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१५ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१४ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n०९ मे १८ सदाफुली\n२७ डिसेंबर १७ सदाफुली\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१५ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१४ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळात एकाच दिवशी शंभर बळी\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…\nवृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…\nजनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nवृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…\nस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\n►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…\n►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…\nकॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा\n►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…\nमुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी\n►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…\nराज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड\n►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…\nतेरा वैभव अमर रहे माँ\n॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…\n॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…\n॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…\n‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित\nअभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…\nचिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार\nऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…\nसंजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…\nसूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49\nHome » आसमंत, पुरवणी » खाजगी क्लासवाल्यांना चाप बसेल का\nखाजगी क्लासवाल्यांना चाप बसेल का\n॥ प्रासंगिक : अरुणकुमार मुंदडा |\nखाजगी क्लासचालकांच्या मनमानीला अटकाव करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने कायदा करण्याचे ठरवले आहे. शासनाने महाराष्ट्र खाजगी शिकवणी (विनियम) अधिनियम २०१८ नावाने मसुदा जाहीर केला आहे. यामध्ये क्लासचालकांसाठी काही कडक नियम घालून दिले आहेत. विद्यार्थ्यांसाठी विविध सोयी सुविधा देणे बंधनकारक केले आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास दंड व पोलिस कारवाईही करण्याचे प्रयोजन आहे. आता जी शिक्षण व्यवस्था आहे, तिच्यावर शासनाचा योग्य प्रकारे अंकूश नाही तर या खाजगी क्लासेसवरती कसा ठेवू शकेल असा प्रश्‍न पडतो. खाजगी क्लासची महाराष्ट्रातील उलाढाल ही शिक्षण खात्याच्या बजेटपेक्षाही मोठी खाजगी क्लासचालकांची लॉबीपुढे शासन किती नमेल की क्लासचालकांना शासन वेसन घालेल असा प्रश्‍न पडतो. खाजगी क्लासची महाराष्ट्रातील उलाढाल ही शिक्षण खात्याच्या बजेटपेक्षाही मोठी खाजगी क्लासचालकांची लॉबीपुढे शासन किती नमेल की क्लासचालकांना शासन वेसन घालेल हे कायदा पास झाल्यानंतर कळेल.\nलातूरमध्ये खाजगी क्लासचालकाचा खून झाल्याने शिकवणी क्षेत्रातही अपप्रवृत्तीने शिरकाव केल्याचे सिध्द झाले. ज्या क्षेत्रात वारेमाप पैसा आहे व प्रचंड नफेखोरी आहे, अशा प्रत्येक क्षेत्रात अशा प्रवृत्ती कार्यरत होत असतात. खाजगी शिकवणी क्षेत्रही त्याला अपवाद कसे ठरू शकेल/ करोडो रुपयांच्या या उद्योगातही खंडणी, दहशत, धमक्या असे प्रकार घडत असल्याने अनेक क्लासचे संस्थाचालक सुरक्षारक्षकांच्या गराड्यात वावरत आहेत. हे दुर्दैवी चित्र दिसून येत आहे. शिक्षण क्षेत्रातही ही किड घुसली आहे, हे या लातूरच्या घटनेमुळे अधोरेखित झाले आहे.\nमुळातच खाजगी क्लासचा बाजार का वाढला याकडे आपले लक्ष गेले पाहिजे. विद्यार्थ्यांना अतिरिक्त मार्गदर्शनाची किंवा शिकवणीची गरज आहे असे पालकांना वाटू लागल्याने खाजगी क्लासला चांगले दिवस आले आहेत. शिक्षण व्यवस्थेत त्रुटी निर्माण झाल्यामुळेच या समांतर व्यवस्थेचा जन्म जाला आहे. आता ही समांतर व्यवस्था महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवर गल्लीबोळातून उभी राहिली आहे. विविध प्रकारच्या प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, पात्रता परीक्षा यांच्या नावाखाली या खाजगी क्लासचालकांचा बाजार सुरु आहे. दिवसेंदिवस बाजारात मागणी वाढल्याने शिकवणीवर्गाची संख्याही वाढु लागली आहे. बारावी नंतरच्या अभियांत्रिकी, वैद्यकीय अन्य तत्सम विविध प्रवेशासाठी सीईटी, नीट, जेईई, आयईईई, आयआयटी अशा अनेक प्रवेश चाचण्या परिक्षांसाठी लाखो विद्यार्थी एकट्या महाराष्ट्रातून बसलेले असतात. या प्रवेश चाचणी परीक्षा काठिण्य पातळीच्या असतात. पंरतू त्यांचा अभ्यासक्रम किंवा सराव बारावीत फारसा घेतला जात नाही. बारावीचा अभ्यासक्रम व प्रात्याक्षिके हे घेण्यातच कॉलेजचा वेळ जातो. त्यांना या प्रवेश चाचण्या परीक्षांचा सराव विद्यार्थ्यांकडून घेण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. म्हणूनच खाजगी क्लासेसचे फ़ावले आहे. विद्यार्थ्याचे दहावी, बारावी चे गुण व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ग्राह्य धरले जात नाहीत तर या प्रवेश चाचणी परिक्षांचे गुण ग्राह्य धरले जातात. ही महत्वाची कमकुवत बाब आहे. यातूनच ही क्लासंस्कृती फोफावली आहे. आपल्या शालेय व उच्च शिक्षण व्यवस्थेतील त्रुटीमुळे उभी राहिलेली ही समांतर व्यवस्था आहे.\nगेल्या काही वर्षात अनेक अशा खाजगी क्लासचालकांनी इंट्रिगेटेड स्कूल व क्लासेस उभारली आहेत. ही स्कूल अशा चाचणी परीक्षांची तयारी अकरावीत, बारावीत विद्यार्थ्यांकडून करून घेतात. राहणे, खाणे, खेळ, शिक्षण प्रयोगशाळा अशा विविध सुविधा एकाच छताखाली मिळत असल्याने ही इंटिग्रेटेड स्कूल्स वर्षाला एका विद्यार्थ्याकडून लाखो रुपयांची फी घेत असतात. असे इंटिग्रेटेड क्लासही आहेत. सरकारी हॉस्पिटल व खाजगी हॉस्पिटल असा जो फरक आहे तसा सरकारी शाळा कॉलेज व इंटिग्रेटेड स्कूलमध्ये आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये साफसफाई, चकचकीतपणा नजरेत जसा भरून येतो. पण खिसा मात्र खाली होतो. तसाच अनूभव या खाजगी क्लासबाबतीत पालकांना येतो.\nखाजगी क्लासकडे ओढा का\nआज आपली शिक्षण व्यवस्था नोकरी सन्मूख आहे. आजकाल शिक्षण हे आधुनिक दुनियेत आवश्यक आहे, शिक्षणाच्या बाबतीत सर्वसमान वर्गात जागृती निर्माण झाली आहे. आपल्या पाल्याला आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी पालक वर्ग आग्रही आहे व जागरूकही आहे. आपली शिक्षण व्यवस्था परीक्षाकेंद्रीत आहे. घोकंपट्टीचा, मार्कच्या रेसमध्ये विद्यार्थ्याला उतरवले जाते म्हणून या क्लासचे विद्यार्थ्यांच्या गुणांकडे लक्ष असते, गुणात्मक दर्जाकडे त्यांचे फारसे लक्ष नसते. क्लासमध्ये विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास होतो का सामाजिक विकास होतो का सामाजिक विकास होतो का त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होते का त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होते का तर याचे कसलेही, काहीही देणेघेणे क्लासला नसते. उलट शाळा, कॉलेजात हे मात्र अनपेक्षित असते. मुलांचा सर्वांगीण विकास करणे, त्यांची बौध्दीक क्षमता वाढविणे, त्यांच्यात सदभावना निर्माण करणे, सुजाण नागरिक घडविण्यासाठी शाळा आटोकाट प्रयत्न करतांना दिसतात. तसा प्रयत्न क्लास करताना फारसे दिसत नाहीत. कोणत्याही क्लासमध्ये प्रतिज्ञा घेतली जात नाही. पण प्रत्येक शाळांमध्ये प्रतिज्ञा आवर्जुन घेतली जाते. क्लासमध्ये कमी जागेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना शिकविले जाते. सोईसुविधा कमी पुरविल्या जातात. विद्यार्थी आकर्षित व्हावा म्हणून बर्याचदा फसव्या व भंपक जाहिराती दिल्या जातात.\nक्लासेसचा बाजार का वाढला\nखाजगी क्लासेसकडे पालक व विद्यार्थी का आकर्षित होतात तर त्याची नस, मर्मबिंदु क्लासेसवाल्यांनी पकडला आहे. जगाच्या बाजारपेठेत तुम्हाला चांगली नोकरी मिळवायची असेल तर तुम्हाला व्यावसायिक शिक्षण घेणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध स्पर्धा परीक्षा, प्रवेश चाचण्या परीक्षा, पात्रता परीक्षा देणे आवश्यक आहे. या परिक्षांमधून गेल्याशिवाय विद्यार्थ्यांना गत्यंतर नसते. या परीक्षा काठीण्य पातळीवरच्या असतात. थोडक्यात अवघड असतात. त्यासाठी खूप घोकंपट्टी करावी लागते, पाठांतर करावे लागते, आकलनशक्ती वाढवावी लागते, ग्रहणशक्ती मजबुत करावी लागते, बौध्दिक क्षमता विकसित करावी लागते, स्मरणशक्ती कौशल्याने तीक्ष्ण करावी लागते असे क्लास संस्कृतीने, भांडवलदारांनी सर्वसामान्य, मध्यमवर्गीय माणसांच्या मनावर बिंबवले आहे.\nया परीक्षांसाठी नियमितपणे अभ्यास करावा लागतो. त्यासाठी खुप मेहनत करावी लागते, त्यासाठी खुप खर्च येतो. त्यासाठी खाजगी क्लासच योग्य प्रकारे या परीक्षांची तयारी करवून घेतात. यामध्ये विद्यार्थी यशस्वी होतात, असाही पालकांचा भ्रम निर्माण करण्यात क्लासंस्कृती यशस्वी ठरली आहे. विविध जाहिरातींच्या माध्यमतून हा भ्रम पालकांच्या मनावर बिंबवण्यात आला आहे. अशा या घोकंपट्टीच्या शिक्षणाचा मोबदला म्हणून पालक क्लासला भरमसाठ फी देण्यास तयार होतात. दहावी व बारावीचे गुण प्रवेश चाचणी परीक्षांसाठी ग्राह्य धरले जात नाहीत व प्रवेश चाचणी परीक्षांचे शिक्षण शाळा, कॉलेजमध्ये व्यवस्थीतपणे दिले जात नाही. या शिक्षण व्यवस्थेच्या त्रुटीतूनच या क्लासचालकांना रान मोकळे मिळाले आहे. यातूनच मनमानी करून पालकांची लुट केली जाते.\nजागतिकीकरण भारतात आले, ते वाढले, ते रुजले आणि ते स्थीर झाले. त्यामुळे भारतीय समाज या आर्थिक प्रगतीला, भौतिक चंगळवादी दुनियेला भुलू लागला. त्यांच्या मनामध्ये पैशांतून मिळणारी समृध्दी ही सर्वोप्रिय आहे, अशी खुळी समजूत भारतीय समाजमनामध्ये पेरण्यामध्ये भांडवलदार वर्ग यशस्वी झाला. ही भांडवलदारी व्यवस्था आहे. जगभरात ही व्यवस्था आधुनिक पध्दतीने कारभार करते. याच व्यवस्थेने पैसे मिळवणार्या क्लासंसस्कृतीला पाठीशी धरले आहे आणि मुल्य मिळवणार्या शालेय व्यवस्थेला दूर लोटले आहे. हे पाप करण्याचे काम राजकीय व्यवस्थेने केले आहे. राजकीय लोकांनी भांडवलदार वर्गाची री ओढत या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा प्रवेश, चाचणी परीक्षा, पात्रता परीक्षा, यांना अधिक महत्व दिले जे भांडवलदारांच्या हिताचे आहे. त्याला पाठबळ राजकीय व्यवस्थेने दिले आहे. ही राजकीय व्यवस्था मातृभाषेतून शिका, कमी पैशातून शिका, मानवी मुल्यांचे शिका असे सांगण्यात कमी पडली, राजकारणी मंडळींनी शिक्षण व्यवस्था सक्षम, समृध्द, सुदृढ फारशी केली नाही, महानगरपालिका, जिल्हा परिषद याशासकीय शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा म्हणूनच खालवलेला आढळतो. या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढवण्याचा प्रयत्न राजकीय व्यवस्थेने केला नाही. तो नेहमी कमकुवत राहील याची दक्षता घेतली गेली त्यामुळे आपल्या पाल्यांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळण्याची आशाच समाप्त झाल्याने पालकांचा कल खाजगी शाळांकडे तसेच खाजगी क्लासकडे अधिक वळला. आज छोट्या मोठ्या सर्व शहरामधून पालकमंडळी इयत्ता पहिलीपासूनच खाजगी क्लासमध्ये मुलांना टाकतांना दिसतात. शहरांमधून आई-वडिल ही पालक मंडळी दिवसभर नोकरी करताना दिसतात त्यामुळे त्यांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, त्यामुळे ते क्लासवर जबाबदारी ढकलून मोकळे होतात.\nसरकारी शाळांना पुरेसे विद्यार्थी मिळत नसल्याने व सोईसुविधांची कमतरता असल्याने या सरकारी शाळांची दुर्दशा झाली आहे. म्हणूनच ही खाजगी क्लासंस्कृती फोफावली आहे. हे सर्व क्लास बाजारू व्यवस्थेशी जोडले आहेत. व्यवहारी वृत्तीने जोडले आहेत. त्यामुळे धंदेवाईक असलेल्या क्लासचालकामधील स्पर्धेमुळे पराकोटीचे वैर निर्माण होत आहे. आता ही स्पर्धा जीवघेणी ठरत असल्यानेच लातूर येथील खुनाच्या घटनेने स्पष्ट झाले आहे. याचे कारण करोडो रुपयांचा हा समांतर व्यवसाय आहे.\nअशी भांडणे शाळा, शाळांमध्ये, कॉलेज – कॉलेजमध्ये कधी झाली नाहीत. कारण त्यांच्यात पैसा कमावण्यासाठी स्पर्धा कधी नव्हती. विद्यार्थी सुजाण, सुशिक्षित, संस्कारी घडवा यासाठी या शाळांमध्ये स्पर्धा होत असतात. विविध प्रकारच्या सांस्कृतिक, कला, क्रीडा स्पर्धा शाळांमध्ये होत असतात, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला फारसे स्थान क्लाससंस्कृतीमध्ये नसते, परंतु शाळेमध्ये कॉलेजमध्ये असते.\nविद्यार्थी हा रेसचा घोडा\nशिक्षण व्यवस्थेतील शाळा व खाजगी क्लास यामधील भांडण आहे. ते गरीब व श्रीमंतीचे आहे. हे सर्व भांडण जागतिकीकरणाने, चकचकीत दुनियेत आधुनिकीकरणाने निर्माण केलेले आहे. विद्यार्थी हा रेसचा पळणारा घोडा आहे, असे समजणार्या भांडवलदारी शिक्षण व्यवस्थेने आणलेले खुळं आहे.\nचांगले शिक्षण म्हणजे खाजगी क्लास, चांगले शिक्षण म्हणजे फक्त चांगले मार्क पडायला हवेत हे समिकरण आज दृढ झाले आहे ते खोटे आहे. खाजगी क्लासचा कधीही वापर न केलेली सरकारी शाळा, कॉलेजमधूनही शिकलेली माणसेही महान झालेली आहेत. त्यांच्या कार्य कर्तृत्वाने अजरामर झालेली आहेत. खाजगी क्लासचे भूत अलिकडच्या २५ वर्षात उभे राहिलेले आहे.\nमहात्मा फुले यांनी इंटर कमिशननं एक पत्र पाठवले होते, त्यात त्यांनी म्हटले होते की, बहुजनांच्या मुलांना शिक्षण द्यायचे असेल तर त्यांना स्पर्धेच्या बाजारात उभे न करता त्यांना मुल्यांचे शिक्षण द्यायला हवे, असे झाले तरच आपला समाज विचारी होवू शकेल.\nशिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे. शिक्षण हेच माणसाच्या प्रगतीचे केंद्रस्थळ आहे, असे अनेक महापुरुषांनी सांगितले आहे. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे, महर्षी शिंदे, यांनी समाजाच्या उन्नतीसाठी शाळा, कॉलेज सुरु केल्या, त्यांनी समाज प्रबोधनासाठी शाळांचा उपयोग केला आज मात्र भांडवलदार वर्ग स्वत:चा फायदा लाटण्यासाठी शिक्षण क्षेत्राचा उपयोग करत आहे.\nबर्याच क्लासचालकांकडे पार्किंगची स्वतंत्र जागा नसल्यामुळे शेकडो विद्यार्थी क्लास शेजारील रस्त्यावर वाहने पार्किंग करत असतात. त्यामुळे वाहतुकीसाठी या रस्त्यावर कोंडी होते. इतर येणार्या, जाणार्या वाहनांना अटकाव होतो, त्याविरुध्द तक्रारी केल्या तरी काही कारवाई होत नाही. कमी जागेत अनेक विद्यार्थी बसविले जातात. एका छोट्या वर्गात १०० पेक्षा जास्त विद्यार्थी बसविले जातात. विद्यार्थ्यांना शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय केली जात नाही. मुलामुलीसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नसतात. विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयींना या खाजगी क्लासमध्ये तोंड द्यावे लागते. शासनाकडे बरेच क्लास नोंदणी करत नाहीत, केली तरी दोन तीन शाखांची नोंदणी केली जाते व इतर शाखा बेकायदेशीरपणे चालविल्या जातात. कमी विद्यार्थी संख्या दाखवली जाते. त्यामुळे उत्पन्नाचा स्त्रोतही कमी दाखवून शासनाची फसवणुक केली जाते. पालकांना फी ची कॅश मेमो पावती दिली जात नाही. सहाजिकच उत्पन्नावरही कर भरण्यासाठी त्यांच्यावर कडक बंधन नव्हते किंवा इतरही बाबतीत त्यांच्यावर शासनाचे कसलेही नियंत्रण नव्हते. प्रस्तावित कायद्यामुळे यामध्ये काही प्रमाणात सुधारणा होवू शकेल.\nहे खाजगी क्लासवाले अनेक मोठ्या कॉलेज संस्थांबरोबर गुप्त समझोता करून विद्यार्थी आपल्याकडे वळवतात. कॉलेजमध्ये विद्यार्थी अडमिशन घेतात पण शिक्षण मात्र या खाजगी क्लासेसमध्ये घेतात. कॉलेजमध्ये शिकतही नाहीत असे समझोते केल्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेजकडून मोकळीक दिली जाते. आत्ता मात्र कॉलेजमधील हजेरी बायोमेट्रिक केल्यामुळे या गोष्टीला अटकावू होवू शकले.\nभेदभावपूर्ण शिक्षण हा गरिबांवरचा अन्याय\nदुसरी बाजु म्हणजे या क्लासमध्ये सर्वसामान्य व्यक्ती आपल्या पाल्याला प्रवेश घेवू शकत नाही. कारण यांची फी लाखांच्या घरात असते. बांधकाम मजूर, हमाल, शिक्षावाले, फेरीवाले, शेतकरी, शेतमजुर, असंघटित कामगार यांच्यासह श्रमिक, कष्टकरी, आदिवासी, शोषित, वंचित, दलित, वर्गातील करोडो पालक ज्यांचे हातावर पोट आहे, अशी माणसे एक लाख रुपये कुठून आणणार म्हणजेच जो वर्ग श्रीमंत आहे तेच लाखो रुपये फी भरून प्रवेश घेवू शकतात. ज्यांची भरण्याची कुवत नाही ते या खाजगी क्लासमध्ये आपल्या मुलांसाठी प्रवेश घेवू शकत नाहीत. यातून एक सामाजिक भेदभावाची दरी निर्माण होत आहे. जे पैसा भरून प्रवेश घेतात त्यांच्यासाठी या प्रवेश परिक्षा पास होण्याची शक्यता निर्माण होते परंतू जे प्रवेश घेवू शकत नाहीत. त्यांच्यात न्युनगंड निर्माण होतो. विद्यार्थी दशेतच उच्च -नीच, बडे-छोटे, गरीब – श्रीमंत, हायक्लास – लोकलक्लास असे भेदभावाची दरी निर्माण होते. यातून सामाजिक विषमता अधोरेखित होते. ङ्गसारे भारतीय माझे बांधव आहेतङ्ख या प्रतिज्ञेतील वाक्याला तडा जातो. विद्यार्थी दशेतील हे असमानतेचे संस्कार पुढे जन्मभर कायम राहत असतात. श्रीमंतांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार शिक्षण मिळणार व गरीब वर्ग त्यापासून वंचित राहणार अशी भेदभावपूर्ण शिक्षण व्यवस्था यातून स्पष्ट दिसून येते.\nहजारो वर्षातील जात व्यवस्थेमुळे हा देश दुर्बल झाला आहे. ती जात व्यवस्था गरीब-श्रीमंतांच्या रुपात आजही अशा कारणामुळे कायम असल्याचे म्हणता येईल. गरीब वर्गाला उच्च शिक्षण घेण्याची संधी यामुळे मिळत नाही. किंबहुना त्याची संधी हिरावूण घेतली जाते. शिक्षणाची समान संधी त्यांना मिळत नाही हा सुध्दा गरीब वर्गावरचा अन्याय आहे.\nप्रस्तावित कायद्यामध्ये गरीबांसाठी ५ टक्के ऐवजी १० टक्के कोठा ठेवणे आवश्यक आहे तसे केले तरच क्लासचालकांना सामाजिक उत्तराई होण्याचे पुण्य मिळेल. आपल्या कमाईतील थोडा हिस्सा गरीब वर्गासाठी खर्च करणेहे सामाजिक कर्तव्य आहे.\nक्लासचालकांसाठी येणार कायद्याचा अटकाव\nखाजगी क्लासचालकांच्या मनमानीला अटकाव करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने कायदा करण्याचे ठरवले आहे. शासनाने महाराष्ट्र खाजगी शिकवणी (विनियम) अधिनियम २०१८ नावाने मसुदा जाहीर केला आहे. यामध्ये क्लासचालकांसाठी काही कडक नियम घालून दिले आहेत. विद्यार्थ्यांसाठी विविध सोयी सुविधा देणे बंधनकारक केले आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास दंड व पोलिस कारवाईही करण्याचे प्रयोजन आहे.\nआता जी शिक्षण व्यवस्था आहे, तिच्यावर शासनाचा योग्य प्रकारे अंकूश नाही तर या खाजगी क्लासेसवरती कसा ठेवू शकेल असा प्रश्‍न पडतो. खाजगी क्लासची महाराष्ट्रातील उलाढाल ही शिक्षण खात्याच्या बजेटपेक्षाही मोठी खाजगी क्लासचालकांची लॉबीपुढे शासन किती नमेल की क्लासचालकांना शासन वेसन घालेल असा प्रश्‍न पडतो. खाजगी क्लासची महाराष्ट्रातील उलाढाल ही शिक्षण खात्याच्या बजेटपेक्षाही मोठी खाजगी क्लासचालकांची लॉबीपुढे शासन किती नमेल की क्लासचालकांना शासन वेसन घालेल हे कायदा पास झाल्यानंतर कळेल. -समुह संपादक\nतेरा वैभव अमर रहे माँ\nखोटी, पण सोपी उत्तरे\nमाध्यान्ह भोजन ते कोट्यवधींचे साम्राज्य\nआजपासून फिफा विश्‍वचषकाची जादू\n फुलराणीने दिले २६ वे सुवर्णपदक\nभारताची सुवर्णझळाळी; एकाच दिवशी १७ पदकांची लूट\nतेजस्विनी, अनिश, बजरंगला सुवर्ण\nकुस्तीपटूंना दोन सुवर्णांसह चार पदके\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळात एकाच दिवशी शंभर बळी\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nSAMB on मग न्यायाधीशांसाठी तरी का उभे राहायचे\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nमग न्यायाधीशांसाठी तरी का उभे राहायचे\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\n७/१२ प्रभागाचा : सोलापूर महानगरपालिका निवडणूक २०१७\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (150) आंतरराष्ट्रीय (467) अमेरिका (166) आफ्रिका (7) आशिया (259) ऑस्ट्रेलिया (2) युरोप (32) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (1) ई-पेपर (159) ई-आसमंत (59) ई-मराठवाडा (48) ई-सदाफुली (4) ई-सोलापूर (48) कलाभारत (4) किशोर भारत (2) क्रीडा (20) छायादालन (36) ठळक बातम्या (8) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (886) आसमंत (841) मानसी (10) युवा भरारी (9) विविधा (4) सदाफुली (22) फिचर (16) महाराष्ट्र (435) उ.महाराष्ट्र (3) प.महाराष्ट्र (15) मराठवाडा (5) मुंबई-कोकण (87) विदर्भ (11) सोलापूर (17) रा. स्व. संघ (48) राज्य (738) आंध्र (12) ईशान्य भारत (42) उत्तर प्रदेश (100) ओडिशा (3) कर्नाटक (80) केरळ (31) गुजरात (98) गोवा (11) जम्मू-काश्मीर (94) तामिळनाडू (35) दिल्ली (52) पंजाब-हरयाणा (28) बंगाल (31) बिहार-झारखंड (66) मध्य प्रदेश-छत्तीसगड (21) राजस्थान (21) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,864) अर्थ (76) कृषी (25) नागरी (822) न्यायालय-गुन्हे (262) परराष्ट्र (83) राजकीय (261) वाणिज्य (13) विज्ञान-तंत्रज्ञान (35) संरक्षण (143) संसद (126) सांस्कृतिक (18) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (5) संपादकीय (795) अग्रलेख (382) उपलेख (412) साहित्य (11) स्तंभलेखक (1,031) अजय देशपांडे (34) अपर्णा क्षेमकल्याणी (10) अभय गोखले (25) अविनाश कोल्हे (10) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (29) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (45) डॉ.परीक्षित स. शेवडे (30) डॉ.वाय.मोहितकुमार राव (28) डॉ.सच्चिदानंद शेवडे (28) तरुण विजय (9) दत्ता पंचवाघ (10) दीपक कलढोणे (36) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (3) ब्रि. हेमंत महाजन (55) भाऊ तोरसेकर (111) मल्हार कृष्ण गोखले (52) यमाजी मालकर (35) योगानंद काळे (1) रत्नाकर पिळणकर (27) रमेश पतंगे (11) रविंद्र दाणी (57) ल.त्र्यं. जोशी (19) वसंत काणे (18) श्याम परांडे (20) श्याम पेठकर (55) श्यामकांत जहागीरदार (57) श्रीकांत पवनीकर (10) श्रीनिवास वैद्य (48) सतीष भा. मराठे (6) सुधीर पाठक (6) सुनील कुहीकर (52) सोमनाथ देशमाने (34) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (26)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nखोटी, पण सोपी उत्तरे\n॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | मराठा आरक्षणाचे घोडे कुठे अडून पडलेले आहे, त्याचे खरेखुरे उत्तर कुठला राजकारणी देणार ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/search?cx=015955889424990834868:frwpj39dz6i&cof=FORID:9&ie=UTF-8&sa=search&siteurl=http://marathi.webdunia.com&q=Cancer+Cause", "date_download": "2018-08-18T09:10:52Z", "digest": "sha1:7GPW6FY2NGSLAJQME7JUPHVV2ZMUEL2K", "length": 3874, "nlines": 86, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Search", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअटलजींच्या प्रेमामुळे राजकारणात आलो\nअटलजींचे माझ्यावर खूप प्रेम होते. अधूनमधून ते माझ्याशी राजकीय विषयांवर गप्पा मारायचे. ...\nशांतीचा दूत म्हणून पाकिस्तानात : सिद्धू\nभारत आणि पाकिस्तानमधील प्रेम आणि शांतीचा सद्‌भावना दूत म्हणून मी पाकिस्तानला जात असून ...\nकेरळ पूर: 324 बळी\nकेरळमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. येथे 100 वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती ...\nपाकच पंतप्रधानपदाची इम्रान खान घेणार आज शपथ\nपीटीआय पक्षाचे प्रुख इ्रान खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून आज शनिवारी शपथ घेणार आहेत. ...\nआता कावळे करणार साफसफाई\nफ्रान्समधील प्यू ड्यू फोयू या ऐतिहासिक पार्कमध्ये सध्या कावळ्यांना कचरा उचलण्याचं ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-18T08:00:14Z", "digest": "sha1:O6KIHVVEOA4RE2CHXNNO4I2R2O3M4WN2", "length": 10621, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पालिकेच्या इंदूर दौऱ्याला राजकीय हेलकावे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपालिकेच्या इंदूर दौऱ्याला राजकीय हेलकावे\nकराडची इंदूर स्वारी यशस्वी,शाहूनगरीचा दौरा परवानगीच्या प्रतिक्षेत\nसातारा, दि. 2 स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात प्रथम आलेल्या इंदूर या शहरास भेट देण्याचा सातारा पालिकेचा स्त्युत्य उपक्रम परवानगीचे राजकीय हेलकावे घेतो आहे. कराडची इंदूर स्वारी यशस्वी झालेली असताना शाहूनगरीचा दौरा अजूनही कागदोपत्री रांगत असल्याचा अनुभव आहे. इंदूरमधील पाहून आलेल्या अनेक गोष्टी आपल्याकडे नाहीत त्या परिपूर्ण करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न व्हावा हीच एक अपेक्षा या दृष्टीने साताऱ्यातही सामुहिक प्रयत्न घडावेत ही अपेक्षा आहे. मात्र राजकीय वरदहस्ताचा प्रचंड बागुलबुवा येथील नेतृत्वानी उभां करून ठेवला आहे. सातारा ते इंदुर या लांब पल्ल्याच्या प्रवासात कोणालाही कसलाही ञास होणार नाही कंटाळा येणार नाही याची सर्वंकश काळजी घेण्याची जवाबदारी मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी घेतली पण विभागीय आयुक्तांकडून आलेल्या चौकशीच्या लेटर बॉम्बने दौऱ्याचा राजकीय घोटाळा झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.\nपुरुष सदस्यांवरची आवश्‍यक ती बंधने, चर्चेचा व संवादाचा उत्तम दर्जा, दिलखुलास करमणूक, चहा पाण्यापासुन ब्रेकफास्ट, भोजन व निवास व्यवस्था दर्जेदार यामुळे कराड पालिकेचा दौरा अतिशय यशस्वी झाल्याची बातमी साताऱ्यात येऊन पोहोचली आणि बुधवारी दुपारी स्थायी समितीचा अजेंडा चाळण्यास सुरवात झाली. मात्र जायचं जायचं इतकच काहीस सांगण्यात आल्याने वर्धापनदिनामुळे उजळलेले चेहरे खट्टू झाले.\nजाता-जाता मोरगावचा मोरेश्वर शिर्डीचे साईबाबा, महेश्वर, ओंकारेश्वर, उज्जैनचा महाकालेश्वर, रांजणगावचा सिध्दिविनायक, महाराष्र्टाचा अभिमान असलेल्या पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांची समाधी दर्शनाचा जय्यत घाट कराडचे मुख्याधिकारी यशवत डांगे यांनी घातला आणि तो पूर्ण केला मात्र साताऱ्यात आरंभशूर मंडळी गणपती उत्सवाचा मुहूर्त शोधण्यात गुंग राहिली.\nस्वच्छ सर्वेक्षणात देशात प्रथम आलेल्या इंदुर शहराच्या पहाणीत घराघरातुन केले जाणारे कचरा व्यवस्थापन, वर्गिकरण व वापर, सिवेज ट्रिटमेंट प्लांट, खत निर्मिती प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प या सर्व उत्तम प्रतिच्या व नियोजनबध्द यंञणांच्या पहाणीतून ज्ञानात नक्किच भर पडली. शहरातील सर्व रस्त्यांना लागून पादचारी मार्ग व त्याला लागून सर्व्हिस रोडवरील विविध वृक्षांचे संवर्धन व जतन तसेच शहरातील चौकाचौकांचे केलेले सुशोभिकरण विविध प्रकल्पांनी इंदूरने देशपातळीवर झेंडा रोवला. सार्वजनिक वापरासाठी ठिकठिकाणी उभारलेल्या शौचालयामुळे सार्वजनिक आरोग्य व स्वच्छतेचे भान ठेवलेले दिसले. पालिकेच्या उत्तम व लीन व्यवस्थापनामुळे नागरिकांचाही स्वच्छ सर्वेक्षणात उस्फुर्त सहभाग घेतल्याने लोकाभिमुख विकासाचे उदाहरण तयार झाले. त्याच इंदूर पॅटर्नची अ वर्ग सातारा पालिकेला गरज आहे. राजकीय एकवाक्‍यता आणि इच्छाशकती कराड पालिकेने दाखवत रवच्छता अभियानासाठी आपण सिद्ध असल्याचे सांगितले. पण साताऱ्यात फुकाचा गाजावाजा झाल्याची राजकीय खसखस पिकू लागली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपाचव्या दिवशी उपोषणस्थळी शेळ्या-मेंढ्या दाखल\nNext articleटेनिसपटू सानिया मिर्झावर बनणार बायोपिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/kajols-movies-trailer-no-1on-trending-404863-2/", "date_download": "2018-08-18T08:00:10Z", "digest": "sha1:BQI6NCVYZDKJ77SNMPRKK5RK36RNYJSR", "length": 6554, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "काजोलच्या चित्रपटाचा ट्रेलर आहे #१ ट्रेंडिंग | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकाजोलच्या चित्रपटाचा ट्रेलर आहे #१ ट्रेंडिंग\nअभिनेत्री काजोल सध्या पुन्हा खूप चर्चेचा विषय ठरत आहे. कधी आपल्या मुलांमुळे, कधी आपल्या जन्मदिनामुळे तर कधी आपल्या येणाऱ्या चित्रपटांमुळे. काजोलचा नवीन चित्रपट येत आहे ‘ हेलीकॉप्टर ईला’ आणि त्याचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे.\nया ट्रेलरची सध्या खूप चलती आहे आणि हा ट्रेलर भलताच पसंद करण्यात येत आहे. हा ट्रेलर जवळजवळ ४८ लाखांपेक्षा जास्त वेळा पहिला गेला आहे. या ट्रेलर मधून चित्रपटाची मूळ कथा आई(काजोल), तिचा कॉलेजवयीन मुलगा, आणि काजोलमधील काही अवगत कला याभोवती फिरणार असल्याचे आपल्या लक्षात येईल.\nत्याचबरोबर काजोलच्या जन्मदिनी तिला दिलेल्या शुभेच्छासाठी देखील तिने सर्वांचे आभार मानणारा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleस्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त पोर्टल\nNext article‘बबन’ व ‘ख्वाडा’नंतर भाऊराव कऱ्हाडे यांची नव्या चित्रपटाची घोषणा\n#HBD व्हिडीओ : सदाबहार गुलजार बर्थ डे स्पेशल\nएव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत टेक केअर गुड नाइट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित\nअटलजींच्या निधनामुळे सिनेसृष्टीतून व्यक्त होतेय हळहळ\nसहा महिन्यानंतर अक्षयकुमारसाठी आली ‘गोल्ड’न मोमेंट…\n“लवरात्री’च्या प्रमोशनदरम्यान आयुषला दंड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/up-akhilesh-yadav-may-have-to-pay-rupees10lakh-401936-2/", "date_download": "2018-08-18T08:00:12Z", "digest": "sha1:7N4JYAJHT4SKPBLGRU2XWMVIUX46GNR6", "length": 7898, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अखिलेश यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करण्याच्या तयारीत योगी सरकार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअखिलेश यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करण्याच्या तयारीत योगी सरकार\nसरकारी बंगल्यात झालेल्या तोडीफोडीमुळे 10 लाखांचे नुकसान\nलखनऊ – यूपी मधील योगी सरकार अखिलेश यादव यांना सरकारी बंगल्यामध्ये तोडफोड करण्याच्या आरोपावरून नोटीस देण्याच्या तयारीत आहेत. पीडब्ल्यूडी विभागाकडून करण्यात आलेल्या चौकशीत बंगल्यात केलेल्या तोडफोडीमुळे 10 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.\nसुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार यूपी मधील सर्व माजी मुख्यमंत्र्याना सरकारी बंगले खाली करण्यात सांगण्यात आले होते. त्यानुसार अखिलेश यादव यांनी बंगला खाली करताना तोडफोड केली होती, याचे काही फोटोसुध्दा मीडियावर आले होते. त्यादरम्यान अखिलेश यादव यांनी म्हटले होते की, भाजप सरकार त्यांना बदनाम करण्यासाठी खोटे आरोप करत आहे. त्यांनी सरकारी बंगल्यात त्यांच्या गरजेनुसार आपल्या पैशातून जिम बनवली होती आणि त्याबरोबरच काही वस्तूही आणल्या होत्या. त्यापैकी काही वस्तू बंगला खाली करताना स्वत: बरोबर घेतल्या होत्या. पंरतु सरकारने याबाबत चौकशी सुरू केली होती.\nपीडब्लूडी विभागाने याबाबतचा चौकशी अहवाल संपत्ति विभागाकडे सपूर्द केला आहे. अहवालानुसार बंगल्यात तोडफोड केल्याने 10 लाखांचे नुकसान झाले आहे. सुत्रांनुसार सरकार या नुकसान भरपाईच्या वसूलीसाठी अखिलेश यांना नोटीस पाठविण्याच्या तयारीत आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमाध्यमांवरील पोस्ट व्हायरल करण्यापूर्वी क्षणभर थांबा, विचार करा, सत्यता पडताळा मगच शेअर करा – विनायक पाचलग\nNext articleवृक्ष लागवडीचे उद्दीष्ट अर्धवटच\nनिम्म्या कर्नाटकवर दुष्काळाचे सावट; मात्र काही भागांत पूरस्थिती\nकाश्‍मीरमधील ग्रेनेड हल्ल्यात एकाचा मृत्यूू, तिघे जखमी\nछत्तीसगडमध्ये भिंत कोसळून तीन ठार\nसात दिवस केरळमध्ये फोन कॉल आणि मोबाईल डाटा वापर विनामुल्य\nतिबेटींचे समर्थक होते अटलजी – दलाईलामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2018-08-18T08:58:28Z", "digest": "sha1:DWWQPQQFX4LSKTQ4HGZUUM4VIQ3DAAD2", "length": 3682, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इस्रायलचे टेनिस खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इस्रायलचे टेनिस खेळाडू\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/sony-cyber-shot-w830-combo-with-lightweight-aluminum-tripod-black-price-pdqkF4.html", "date_download": "2018-08-18T08:12:02Z", "digest": "sha1:UXCYHBT6XSGDHGXAJBEX6IAERIGRU7PB", "length": 20410, "nlines": 477, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी सायबर शॉट व८३० कॉम्बो विथ लीगतवेइगत अलुमिनिम ट्रायपॉड ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी सायबर शॉट दशकं व८३० डिजिटल कॅमेरा\nसोनी सायबर शॉट व८३० कॉम्बो विथ लीगतवेइगत अलुमिनिम ट्रायपॉड ब्लॅक\nसोनी सायबर शॉट व८३० कॉम्बो विथ लीगतवेइगत अलुमिनिम ट्रायपॉड ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी सायबर शॉट व८३० कॉम्बो विथ लीगतवेइगत अलुमिनिम ट्रायपॉड ब्लॅक\nसोनी सायबर शॉट व८३० कॉम्बो विथ लीगतवेइगत अलुमिनिम ट्रायपॉड ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये सोनी सायबर शॉट व८३० कॉम्बो विथ लीगतवेइगत अलुमिनिम ट्रायपॉड ब्लॅक किंमत ## आहे.\nसोनी सायबर शॉट व८३० कॉम्बो विथ लीगतवेइगत अलुमिनिम ट्रायपॉड ब्लॅक नवीनतम किंमत Jul 27, 2018वर प्राप्त होते\nसोनी सायबर शॉट व८३० कॉम्बो विथ लीगतवेइगत अलुमिनिम ट्रायपॉड ब्लॅकऍमेझॉन, स्नॅपडील उपलब्ध आहे.\nसोनी सायबर शॉट व८३० कॉम्बो विथ लीगतवेइगत अलुमिनिम ट्रायपॉड ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 20,198)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी सायबर शॉट व८३० कॉम्बो विथ लीगतवेइगत अलुमिनिम ट्रायपॉड ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी सायबर शॉट व८३० कॉम्बो विथ लीगतवेइगत अलुमिनिम ट्रायपॉड ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी सायबर शॉट व८३० कॉम्बो विथ लीगतवेइगत अलुमिनिम ट्रायपॉड ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 1164 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी सायबर शॉट व८३० कॉम्बो विथ लीगतवेइगत अलुमिनिम ट्रायपॉड ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसोनी सायबर शॉट व८३० कॉम्बो विथ लीगतवेइगत अलुमिनिम ट्रायपॉड ब्लॅक वैशिष्ट्य\nफोकल लेंग्थ 4.5 - 36 mm\nअपेरतुरे रंगे F3.3 - F8.0\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन Approx. 20.1 mega pixels\nसेन्सर तुपे Super HAD CCD\nडिजिटल झूम Approx. 32x\nऑडिओ विडिओ इंटरफेस Yes\nमॅक्रो मोडे Auto Macro\nएक्सपोसुरे कॉम्पेनसशन 1/3 EV Steps +/- 2.0 EV\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230400 dots\nसोनी सायबर शॉट व८३० कॉम्बो विथ लीगतवेइगत अलुमिनिम ट्रायपॉड ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-18T09:07:24Z", "digest": "sha1:K4VQCXNWGI45ARCTB7HFWY2TJ72WGWSN", "length": 7172, "nlines": 62, "source_domain": "m4marathi.com", "title": "मार्कंडा मंदिर | m4marathi", "raw_content": "\nमार्कंडा हे देवस्थान विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात आहे. संथपणे वाहणारी उत्तरवाहिनी वैनगंगा आणि तिच्या तिरावरची अप्रतिम स्थापत्यशैली असलेली ही मंदिरे, बघता क्षणीच मनाला भुरळ घालणारी आहेत. मार्कंडा येथील देवालये दक्षिणोत्तर १९६ फूट लांब आणि पूर्व-पश्चिम १६८ फूट लांब अशी काटकोनात वसलेली आहेत. सभोवती ९ फूट उंचीची भिंत आहे आणि काटकोनी आकारामध्ये एकूण १८ देवळे आहेत. या देवळांपैकी मार्कंडेय ऋषींचे देऊळ, यमधर्म आणि महादेवाचे मंदिर हे उत्कृष्ट शिल्पकृतीचे नमुने आहेत. या प्रकारात मार्कंडेय ऋषी, नंदिकेश्वर, यमधर्म, भृशुंडीमुनी, मृत्युंजय, विठ्ठल रखुमाई, उमाशंकर, दशावतार, शक्तिदेवी, हनुमान, गणेश, शंकर, विश्वेश्वर, भीमेश्वर, वीरेश्वर इ. मंदिरे आहेत. या मंदिराकडे बघतांना आपण खजुराहोची मंदिरे बघत असल्याचा भास होतो.येथील मंदिरांच्या भिंतींवर अनेक देवदेवतांची तसेच विविध सुरसुंदरींची चित्रे कोरलेली आढळतात.\nअत्यंत बारीक नक्षीदार कलाकुसर हे या मंदिरांचे वैशिष्ट्य आहे. मानवी जीवनाच्या विविध छटा, आणि अनुभवांचे मूर्तिमंत चित्रण या मंदिरांमध्ये करण्यात आले आहे. मानवी आकृत्या चितारतांना चेहऱ्यावरचे हावभाव ठळकपणे चित्रित केले आहेत. ‘मैथुन शिल्पे’ हे मार्कंडा मंदिरांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. कलावंतांनी जीवनाचा सर्व अंगांनी केलेला विचार बघून आपण थक्क होतो. मार्कंडा मंदिरांना ‘विदर्भाची काशी’ म्हणतात ते उगाच नाही.\nया मंदिरांची प्रत्येक मूर्ती डोळ्यात साठवून ठेवावी अशीच आहे. पण त्यातही एके ठिकाणी असलेली एका युवतीची मूर्ती नितांत सुंदर म्हणावी अशी आहे. तिच्या हातात आंब्याची डहाळी आहे. बहुधा, ती ‘आम्रपाली’ चे द्योतक असावी. या मूर्तीवरचे अलंकार, वस्त्रे, सगळेच देखणे आहे. एवढेच नाही, तर आंब्याच्या डहाळीचे पान न् पान ठळकपणे जाणवते. आणि आपण आपोआपच या अनामिक शिल्पकारांपुढे नतमस्तक होतो.\nमार्कंडाला महाशिवरात्रीला मोठी यात्रा असते. छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि विदर्भाच्या इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर यात्रेकरू इथे दर्शनाला येतात. या काळात इथे लोकांची खूप वर्दळ असते. पण एरवी ही मंदिरे वर्दळीपासून काहीशी दूर आहेत. १५० वर्षापूर्वी या मंदिरावर वीज कोसळली होती. त्यामुळे मंदिराचे खूप नुकसान झाले आहे. थोडी पडझड झाली आहे. पण या मंदिरांचे देखणेपण आजही टिकवून आहेत. हजारो वर्षापूर्वी बांधलेली ही मंदिरे भारतीय शिल्पकृतीचे देखणे उदाहरण आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/opposition-shiv-senas-movement-lift-ban-liquor-46190", "date_download": "2018-08-18T08:26:16Z", "digest": "sha1:5X7AOLIHMBPYFVGAUVXRDM32PBR6B6ZD", "length": 12963, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Opposition by Shiv Sena's movement to lift the ban on liquor मद्यविक्रीची बंदी उठविण्यास शिवसेनेचा आंदोलनाद्वारे विरोध | eSakal", "raw_content": "\nमद्यविक्रीची बंदी उठविण्यास शिवसेनेचा आंदोलनाद्वारे विरोध\nशुक्रवार, 19 मे 2017\nपुणे - महापालिकेच्या हद्दीतून जाणारे राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या 500 मीटर परिसरातील मद्यविक्री राज्य सरकारने उठवू नये, या मागणीसाठी शिवसेनेने महापालिकेच्या आवारात गुरुवारी टाळ-मृदगांच्या गजरात भजन आंदोलन केले. \"दिसताच दारू-बाटली ऐरणीवर', \"रस्ते भकास, दारू- बाटलीचा विकास', \"मुख्यमंत्री करणार का सुप्रीम कोर्टाचा अवमान' आदी घोषणा शिवसेना कार्यकर्त्यांनी या वेळी दिल्या.\nपुणे - महापालिकेच्या हद्दीतून जाणारे राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या 500 मीटर परिसरातील मद्यविक्री राज्य सरकारने उठवू नये, या मागणीसाठी शिवसेनेने महापालिकेच्या आवारात गुरुवारी टाळ-मृदगांच्या गजरात भजन आंदोलन केले. \"दिसताच दारू-बाटली ऐरणीवर', \"रस्ते भकास, दारू- बाटलीचा विकास', \"मुख्यमंत्री करणार का सुप्रीम कोर्टाचा अवमान' आदी घोषणा शिवसेना कार्यकर्त्यांनी या वेळी दिल्या.\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर 500 मीटर परिसरामध्ये मद्यविक्री आणि बारवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार, आता शहरांमधून जाणाऱ्या सर्व महामार्गांवरील मद्यविक्री बंद आहे. मद्यविक्रीवरील बंदी उठविण्याचा निर्णय घेण्यास महापालिकेने विरोध दर्शविला असून, त्या बाबतचा निर्णय पाटबंधारे विभागाने राज्य सरकारमार्फत घ्यावा, असे पत्र आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर पुण्यात दारूची दुकाने सुरू करण्यास शिवसेनेने महापालिकेत आंदोलन करून विरोध केला. त्यात भगव्या साड्या परिधान करून महिला, भगव्या टोप्या घालून कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nशिवसेनेचे गटनेते संजय भोसले, नगरसेवक पृथ्वीराज सुतार, बाळा ओसवाल, अविनाश साळवे, विशाल धनवडे, नाना भानगिरे, संगीता ठोसर, पल्लवी जावळे, श्वेता चव्हाण, प्राची आल्हाट, तसेच अशोक हरणावळ, महिला आघाडीच्या राधिका हरिश्‍चंद्रे, मकरंद पेठकर, संजय वाल्हेकर, राजेश परदेशी आणि कार्यकर्ते त्यात सहभागी झाले होते.\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nबारामती - विद्या प्रतिष्ठानच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पुरस्कार\nबारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nपंकज भूसे यांचा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव\nसरळगांव - महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी होऊन दिलेल्या उद्दिष्टा पेक्षा जास्त वृक्ष लागवड करून उत्कृष्ट कामगिरी केल्याने...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/kolkata-merchant-ship-burning-123726", "date_download": "2018-08-18T08:55:23Z", "digest": "sha1:HCR7IX6227DQX5L3O4TOZC374KWY2PBA", "length": 11493, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "in kolkata merchant ship on burning मालवाहू जहाजाला भीषण आग | eSakal", "raw_content": "\nमालवाहू जहाजाला भीषण आग\nगुरुवार, 14 जून 2018\nकोलकाता : कोलकातामधील एका मालवाहू जहाजाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. एमव्ही कोलकाता असे जहाजाचे नाव असून, जहाजातील कंटेनरमध्ये स्फोट झाल्याने आग लाल्याचे सांगितले जात आहे. या जहाजावर एकूण 22 कर्मचारी होते. त्यातील 11 क्रु मेम्बरची सुटका करण्यात तटरक्षक दलाला यश आले आहे. बदलते हवामान आणि जोरदार वाहणारे वारे यामुळे आग झपाट्याने पसरली. या आगीत 70 जहाज जळून खाक झाले आहे. कोलकात्याच्या श्रेयस लॉजिस्टिक्स या कंपनीचे हे जहाज आहे.\nकोलकाता : कोलकातामधील एका मालवाहू जहाजाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. एमव्ही कोलकाता असे जहाजाचे नाव असून, जहाजातील कंटेनरमध्ये स्फोट झाल्याने आग लाल्याचे सांगितले जात आहे. या जहाजावर एकूण 22 कर्मचारी होते. त्यातील 11 क्रु मेम्बरची सुटका करण्यात तटरक्षक दलाला यश आले आहे. बदलते हवामान आणि जोरदार वाहणारे वारे यामुळे आग झपाट्याने पसरली. या आगीत 70 जहाज जळून खाक झाले आहे. कोलकात्याच्या श्रेयस लॉजिस्टिक्स या कंपनीचे हे जहाज आहे.\nकृष्णपटनम येथून कोलकात्याला निघालेले हे मालवाहू जहाज होते. या जहाजावर एकूण २२ कर्मचारी या जहाजावर असल्याची माहिती आहे. बुधवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास जहजामधील कंटेनरमध्ये स्फोट होऊन ही आग लागल्याचे समजते. पश्चिम बंगालमधील हल्दियापासून सुमारे ६० नॉटिकल्स माईल्स अंतरावर हे जहाज होते. आगीची माहिती समजताच भारतीय तटरक्षक दलाचे राजकिरण हे जहाज आणि डॉर्निअर विमान बचावकार्यासाठी पाठवले. तटरक्षक दलाच्या जहाजांद्वारे बचावकार्य सुरु आहे. कोलकाता बंदर आणि इतर ठिकाणाहून मदत पोहचवली जात आहे.\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nपुन्हा माझा बळी देऊ नका - सतेज पाटील\nकोल्हापूर - ‘माझ्यासह कार्यकर्त्यांच्या गाफीलपणामुळे मागील निवडणुकीत माझा बळी गेला. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा माझा बळी देऊ नका’, अशा इशारा...\nमराठवाड्यात 189 मंडळांत अतिवृष्टी\nऔरंगाबाद - महिनाभराच्या खंडानंतर पावसाने दोन दिवस मुक्‍काम करीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सर्वदूर...\nधडपड - शेतकऱ्यांत विश्‍वास निर्माण करण्याची\nसातारा - शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते, हे दाखवून देण्यासाठी युवकाने शेअर फार्मिंगच्या (गटशेती) माध्यमातून खातवळ येथे ४० एकरांत करार शेती करण्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/avinash-chavan-murder-case-five-people-custody-126641", "date_download": "2018-08-18T08:54:58Z", "digest": "sha1:VZSKSVXEHV3HLCWDMMYYFO2BC6RDGTGH", "length": 11316, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Avinash Chavan murder case five people in custody अविनाश चव्हाण खूनप्रकरणातील पाचही जणांना कोठडी | eSakal", "raw_content": "\nअविनाश चव्हाण खूनप्रकरणातील पाचही जणांना कोठडी\nबुधवार, 27 जून 2018\nलातूर : येथील स्टेप बाय स्टेप क्लासेस संचालक अविनाश चव्हाण यांचा गोळी झाडून खून केल्या प्रकरणात अटकेत असलेल्या पाचही जणांना बुधवारी (ता. २७) येथील न्यायालयासमोर उभे करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना (ता. ३) जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.\nलातूर : येथील स्टेप बाय स्टेप क्लासेस संचालक अविनाश चव्हाण यांचा गोळी झाडून खून केल्या प्रकरणात अटकेत असलेल्या पाचही जणांना बुधवारी (ता. २७) येथील न्यायालयासमोर उभे करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना (ता. ३) जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.\nयेथील स्टेप बाय स्टेप क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांचा सोमवारी मध्यरात्री येथे गोळी झाडून खून करण्यात आला होता.या प्रकरणात चव्हाण यांचा एकेकाळचा भागीदार प्रा. चंदनुकमार शर्मा हा मास्टर माईंड निघाला होता. त्याच्यासह पोलिसांनी करण गहिरवार, महेंद्रकुमार बोगाडे,शरद घुमे, अक्षय शेंडगे यांना अटक केली होती. या सर्वांना बुधवारी न्यायालयासमोर उभे करण्यात आले आहे. या आरोपींकडून आणखी तपास करायचा असल्याने त्यांनाकोठडी मिळावी अशी मागणी पोलिसांच्या वतीने वकिलांनी केली. ती मान्य करीतन्यायालयाने या पाचही आरोपींना (ता. ३) जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती तपास अधिकारी पोलिस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी दिली.\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nउंड्री - पाचव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजूर ठार\nउंड्री - गुलाम अली नगर गल्ली नं 6 दि.13 ऑगस्ट दु.12.30 वाजता एका निर्माणाधीन इमारतीचे काम सुरू असताना पाचव्या मजल्यावर पडून राजशेखर माशाले (वय 33...\nरावेतला स्वतंत्र पोलिस चौकीची मागणी\nवाल्हेकरवाडी - रावेत परिसराचा विकास झपाट्याने वाढत आहे, त्याचप्रमाणे गुन्हेगारीही वाढत आहे. रावेत परिसरात गुन्हा घडला अथवा काही कारणास्तव पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/ajey-lele-write-social-media-hackers-article-editorial-136049", "date_download": "2018-08-18T08:55:11Z", "digest": "sha1:YIBR2LTHJKOXIBOR4M3XIRZJHSFCXWJS", "length": 27255, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "ajey lele write social media hackers article in editorial हॅकर्सचा उपद्रव | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nसध्या सोशल मीडियावर \"किकी चॅलेंज'नेही धुमाकूळ घातलाय. गेल्याच महिन्यात कॅनडाचा संगीतकार-गायक ड्रेकने \"इन माय फिलिंग' या गाण्याच्या माध्यमातून हे चॅलेंज इन्स्टाग्रामवर व्हायरल केले. चालत्या वाहनातून उतरत ड्रेकच्या गाण्यावर नृत्य करत हे चॅलेंज पूर्ण करावे लागते. मात्र, त्यासाठी अनेकजण जीव धोक्‍यात घालून चालत्या वाहनातून उड्या घेत आहेत.\nसध्या सोशल मीडियावर \"किकी चॅलेंज'नेही धुमाकूळ घातलाय. गेल्याच महिन्यात कॅनडाचा संगीतकार-गायक ड्रेकने \"इन माय फिलिंग' या गाण्याच्या माध्यमातून हे चॅलेंज इन्स्टाग्रामवर व्हायरल केले. चालत्या वाहनातून उतरत ड्रेकच्या गाण्यावर नृत्य करत हे चॅलेंज पूर्ण करावे लागते. मात्र, त्यासाठी अनेकजण जीव धोक्‍यात घालून चालत्या वाहनातून उड्या घेत आहेत.\nसायबर सुरक्षेच्या संदर्भात सर्व जगातच विचार सुरू आहे. त्यावर ठोस तोडगा सापडला आहे, असे नाही; पण तज्ज्ञांच्या प्रयत्नांना माध्यमांच्या विवेकी वापराची जोड असणे आवश्‍यक आहे. इंटरनेटच्या माध्यमातून एखादी संकल्पना लोकप्रिय होते आणि मग तिला आणखी बरीच वाक्‌वळणे मिळतात. \"आव्हाने' (चॅलेंज) देणे हा एक असाच प्रकार किंवा संकल्पना. 2014 मध्ये \"आइस बकेट चॅलेंज' हा प्रकार अस्तित्वात आला. यात सभोवतालचे तापमान लक्षात न घेता एखाद्या व्यक्तीच्या डोक्‍यावर बर्फ व पाण्याने भरलेली बादली ओतली जाते. या कृतीमागील प्रत्यक्ष हेतू मात्र उदात्त होता आणि आहे. जगभरात \"मोटार न्यूरॉन डिसीज'बद्दल जागृती करून या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी निधी जमा करण्यासाठी हा उपक्रम राबविला जातो. सोशल मीडियाचेही या संकल्पनेच्या प्रसारात मोलाचे योगदान आहे. या संकल्पनेचे यश लक्षात घेऊन खेळाडू, राजकारणी, अभिनेत्यांपासून सर्वसामान्यांनीही वेगवेगळी चॅलेंजेस दिली. अर्थात, त्यामागे प्रसिद्धी आणि निधीची उभारणी हे दोन्ही उद्देश होते. आता आव्हान देण्याच्या या प्रकारालाही वेगवेगळी परिमाणे लाभली आहेत.\nकाही दिवसांपूर्वीचीच गोष्ट. दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात \"ट्राय'च्या प्रमुखांची वैयक्तिक माहिती इंटरनेटविश्‍वात उघड झाली. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर स्वतःचा आधार क्रमांक जाणीवपूर्वक जाहीर केला. केवळ आधार क्रमांकाच्या माहितीवरून आपले कुणीही नुकसान करू शकत नाही, हे दाखविण्याचा त्यांचा हेतू होता. मात्र, हा आत्मविश्‍वास फोल ठरला. हॅकर्सनी हे आव्हान यशस्वीपणे पेलत ट्राय प्रमुखांच्या बॅंक खात्याच्या माहितीसह इतरही वैयक्तिक तपशील जाहीर केला. आता, यानंतर हॅकिंगचा हा प्रकार खरा होता, की गुगल वापरून ही माहिती गोळा करण्यात आली, याबद्दल प्रत्येकजण आपापला वेगवेगळा दावा करत आहे. अर्थात, ट्राय प्रमुखांच्या बॅंक खात्यात जमा केलेला एक रुपया ही वस्तुस्थिती हॅकर्स कुठल्या थराला पोचले आहेत, हेच दाखवून देतो. केवळ गुगलच्या माध्यमातून त्यांची माहिती गोळा केली नसल्याचे निदर्शनास येते. हॅकिंग करणाऱ्यांमुळे निर्माण होणाऱ्या प्रश्‍नांकडे डोळेझाक केली जाऊ नये, हॅकर्सना सहजतेने घेऊ नये, हा या प्रसंगातून शिकण्यासारखा सर्वांत मोठा धडा.\nअलीकडच्या काही वर्षांत संगणक आणि सोशल मीडियाच्या प्रसारामुळे हॅकिंगची कल्पना सर्वांना माहीत झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात कॉम्प्युटर हॅकिंग 1960 पासून अस्तित्वात आहे. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (एमआयटी)मध्ये हॅकिंगचा पहिला प्रयत्न झाला. बेल लॅब्सने साठच्या दशकात विकसित केलेल्या \"युनिक्‍स' या ऑपरेटिंग सिस्टिमलाही हॅकर्सनी लक्ष्य केले होते. हॅकिंगच्या सूत्रबद्ध आणि यशस्वी हल्ल्यामध्ये या हल्ल्याचा समावेश केला जातो. अर्थात, संगणकाची ऑपरेटिंग सिस्टिम विस्कळित करणारा हा एकमेव हल्ला नाही. त्यापुढील काळात हॅकिंगची मालिकाच उभी राहिलेली दिसते. या हल्ल्यांतून हॅकर्स काय करू शकतात, याची कल्पनाच जगाला आली. इराण आपल्या उसन्या अवसानाच्या जोरावर करू पाहणारे अणुधाडसही हॅकर्सनी \"स्टक्‍सनेट' या कॉम्प्युटर मालवेअरमधून रोखले होते. आजच्या आधुनिक काळाचा विचार केला, तर सायबर सुरक्षा हा अवघ्या जगाच्याच काळजीचा विषय बनला आहे. आज तरी या जगव्यापी समस्येवरचा तोडगा दृष्टिपथात नाही. खरेतर, हॅकिंगचे हेतूनुसार दोन प्रकार पडतात. चांगल्या हेतूने हॅकिंग करणारे हॅकर्स \"एथिकल हॅकर्स' म्हणून ओळखले जातात. हे हॅकर्स यंत्रणेतील त्रुटी हेरून त्या दुरुस्त करण्यास मदत करतात. यंत्रणेच्या आराखड्यातील त्रुटींच्या दुरुस्तीमुळे ती मजबूत, विकसित होते. वाईट हेतूने हॅकिंग करणारे मात्र उपद्रव देणारे, नुकसान करणारे असतात.\nसध्या विशेषत: आर्थिक क्षेत्रात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेय. जगभरात दिवसभरात कुठेतरी बॅंकांमधील गैरव्यवहारही उघडकीस येत आहेत. खरंतर, विविध सायबर साधने वापरून सर्वच क्षेत्रांमध्ये गैरव्यवहार होताना दिसतात. रशियन नागरिकांनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत केलेल्या गैरप्रकारांपासून इतर कुठलीही किंवा जवळपास प्रत्येक गोष्ट सायबर हल्ल्यांच्या टप्प्यात आली आहे. हा धोका लक्षात घेऊनच सायबर सुरक्षेसाठी विविध प्रकारचे उपाय योजले जात आहेत. \"क्रिप्टोग्राफी' ही कूटलिपी भाषाही त्यापैकीच एक. सायबर सुरक्षेच्या व्यवस्थापनातील विविध उत्कृष्ट पर्यायांमध्ये क्रिप्टोग्राफीचा समावेश होतो. क्रिप्टोग्राफीमध्ये हॅकर्सकडून होणाऱ्या विविध सायबर हल्ल्यांपासून सुरक्षा करण्यासाठी एनक्रिप्शनच्या प्रक्रियेचा वापर केला आहे. एनक्रिप्नशमध्ये संदेश किंवा माहितीचे सांकेतिक भाषेत (एनकोडिंग) आदान-प्रदान होते. ही सांकेतिक भाषा अशा प्रकारची असते, की अनधिकृत व्यक्तींना या भाषेपर्यंत पोचता येऊ शकत नाही. विविध मेसेजिंग ऍप्सच्या आजच्या जगात प्रत्येक गोष्ट अशा प्रकारे एनक्रिप्ट करता येऊ शकते. दुसऱ्या बाजूला सायबर सुरक्षा हे एक प्रकारचे मिथक असून, शून्य आणि एक या बायनरी कोडच्या भाषेत अस्तित्वात येणारी प्रत्येक गोष्ट हॅक करण्यासारखी असते, असाही एक मतप्रवाह आहे. त्याचप्रमाणे, तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी जोडलेले असाल तर हल्लेखोराला तुम्हाला लक्ष्य करणे आणखी सोपे होते, असेही मानले जाते. अन्यथा, ते अशक्‍यच.\nया सर्व विवेचनाचे तात्पर्य एवढेच, की सायबर जगतात तुम्ही वैयक्तिकरीत्या शक्‍य तितके जागरूक राहायला हवे. आपले स्वातंत्र्य, खासगीपणाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी आपणही थोडी काळजी घेतली पाहिजे. एखाद्याने हॅकर्स समुदायाला उघड आव्हान दिलेच, तर उर्वरित यूजर्संनी कुणीतरी हे आव्हान स्वीकारेल, हे ओळखायला हवे. नव्हे तशी खात्रीच बाळगावी. खरंतर, अशा प्रकारे आव्हान देताना तुम्ही अनावश्‍यकरीत्या स्वतःला धोक्‍यात टाकता. आजच्या सोशल मीडियाच्या जगतात समोर आला आहे, तो आयडेंटिटी क्रायसिस. स्वतःच्याच ओळखीला पारखे होण्याच्या संकटातून आपण जात आहोत. एकविसाव्या शतकात \"डाटा' ही सर्वांत मौल्यवान अशी गोष्ट असेल. जगभरातच लोक सायबरविश्‍वात प्रस्तुत आणि अप्रस्तुत अशा सर्वच प्रकारच्या \"डाटा'ची निर्मिती करत आहेत. सोशल मीडियावर आपले यश, संपत्ती, विचार, दृष्टिकोन आदींबाबत उर्वरित जगाला सांगण्याची एक प्रकारची छुपी स्पर्धाच सुरू झालीय. समाजाने आपली दखल घ्यावी, यासाठीची धडपड फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर दिसून येते.\nआज जगभरातील सर्वोत्तम मानवी मेंदू हॅकिंगच्या मोठ्या व्यवसायात गुंतलेले आहेत. जागतिक अँटिसॉफ्टवेअर उद्योग चांगल्या अवस्थेत आहेत. तसे होण्यास बुद्धिमान, पण वाईट हेतूने हॅकिंग करणारे कारणीभूत ठरले आहेत. आपल्यापैकी कोणत्याही सर्वसामान्य भारतीयांसाठी \"आधार' क्रमांकाची कल्पना चांगलीच. प्रत्येक भारतीयाला काही प्रमाणात तरी स्वतःची विशिष्ट ओळख प्रदान करणारे \"आधार' अनेक बाबतीत उपयुक्त आहे. तथापि, ते \"हॅक' होऊ शकत नाही, असा याचा अर्थ नाही. त्याच वेळी, एखाद्याविषयी जाणून घेण्याचा \"आधार' हा एकमेव डिजिटल पर्याय आहे, असे समजण्याचेही काहीच कारण नाही. सोशल मीडियातील विविध संकेतस्थळांवर काहीजण स्वत:च्या इच्छेनुसार आपल्या पाऊलखुणा सोडत असतो. खरे तर सायबर जगतात हॅकिंगची टांगती तलवार कायम असते. सोशल मीडियावर मुशाफिरी करतानाच अनावश्‍यकरीत्या स्वतःचे नुकसान होऊ न देण्याचे खरे आव्हान असते. आपण स्वतःच स्वतःच्या नुकसानास कारणीभूत होता कामा नये. आपण स्वत:हून हॅकर्सना आव्हान देत नाही, तोपर्यंत आपल्यापैकी बहुतेकांमध्ये हॅकर्सना कसलाही रस नाही, हेही लक्षात घ्यायला हवे. सुरवातीला उल्लेख केलेले \"आइस बकेट चॅलेंज' आणि हॅकर्सला आव्हान देणे या दोन गोष्टींमध्ये लक्षणीय फरक आहे.\nप्रियंका-जोनसचा पार पडला 'रोका'\nमुंबई : गेले अनेक दिवस चर्चेत असलेल्या अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि तिचा प्रियकर अमेरिकन गायक निक जोनास यांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली...\nबारामती - विद्या प्रतिष्ठानच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पुरस्कार\nबारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट...\nपंकज भूसे यांचा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव\nसरळगांव - महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी होऊन दिलेल्या उद्दिष्टा पेक्षा जास्त वृक्ष लागवड करून उत्कृष्ट कामगिरी केल्याने...\nपिंपळवंडीला मानव-बिबट सहजीवन जनजागृती\nजुन्नर - पिंपळवंडी ता.जुन्नर येथे मानव व बिबट संघर्ष व सहजीवन याविषयी मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती करण्यात आली. जुन्नर वन विभाग तसेच...\nरावेतला स्वतंत्र पोलिस चौकीची मागणी\nवाल्हेकरवाडी - रावेत परिसराचा विकास झपाट्याने वाढत आहे, त्याचप्रमाणे गुन्हेगारीही वाढत आहे. रावेत परिसरात गुन्हा घडला अथवा काही कारणास्तव पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/maratha-kranti-morcha-bike-rally-akola-133371", "date_download": "2018-08-18T08:54:19Z", "digest": "sha1:6VQP7JBGXLSAZVWKVX2BUBUIEGXELCNX", "length": 11670, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "maratha kranti morcha bike rally at akola मराठा आरक्षणासाठी अकोला बंद, विशाल मोटारसायकल रॅलीने वेधले लक्ष | eSakal", "raw_content": "\nमराठा आरक्षणासाठी अकोला बंद, विशाल मोटारसायकल रॅलीने वेधले लक्ष\nबुधवार, 25 जुलै 2018\nअकोला : मराठा आरक्षण तातडीने देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवार (ता. 25) रोजी शहरासह जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आलेे. या आवाहनास अकोला प्रतिसाद देत जिल्ह्यातील तालुक्याची शहरे व मोठ्या गावांमध्ये व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली.\nअकोला : मराठा आरक्षण तातडीने देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवार (ता. 25) रोजी शहरासह जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आलेे. या आवाहनास अकोला प्रतिसाद देत जिल्ह्यातील तालुक्याची शहरे व मोठ्या गावांमध्ये व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली.\nकाही ठिकाणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता-रोको आंदोलन केले. तर राष्ट्रीय महामार्गावर कार्यकर्त्यांनी टायर पेटवून वाहतुक अवरुद्ध करण्याचा प्रयत्न केला. सकल मराठा समाज अकोला जिल्हा शाखेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी अकोला शहरातून मोटारसायकल रॅली काढून बंद पाळण्याचे आवाहन केले. शहरातील पवत्राल पंप दुपारपर्यंत बंद होते. नेहमीच्या शिस्तीत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या ‘एक मराठा-लाख मराठा’, ‘जय शिवाजी-जय भवानी’च्या जयघोषाने शहर दणाणून गेले होते. दरम्यान, परिवहन यंत्रणेवर बंदचा परिणाम दिसून आला नाही. बहुतांश मार्गांवरील बसगाड्या सुरु असल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला.\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून सहाजण जखमी\nबेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने बंगळूरकडे जाणारी व्हीआरएलची आराम बस उलटून चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय...\nरावेतला स्वतंत्र पोलिस चौकीची मागणी\nवाल्हेकरवाडी - रावेत परिसराचा विकास झपाट्याने वाढत आहे, त्याचप्रमाणे गुन्हेगारीही वाढत आहे. रावेत परिसरात गुन्हा घडला अथवा काही कारणास्तव पोलिस...\nघरकामगार, बांधकाम मजूर महिलांची उपेक्षाच\nजळगाव : दिवसरात्र काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, पण डोक्‍यावर हक्काचं छत नाही...सतत कष्ट करूनही पदरी काहीच न पडल्यामुळे अनेकदा उपवास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-digital-ixus-265-hs-point-shoot-digital-camera-pink-price-p9eUhU.html", "date_download": "2018-08-18T08:14:00Z", "digest": "sha1:UD4X4DV2RWLGOFHEETACOVRMIJDLUYM7", "length": 19139, "nlines": 447, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन डिजिटल इक्सस 265 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन इक्सस 265 हंस पॉईंट & शूट\nकॅनन डिजिटल इक्सस 265 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक\nकॅनन डिजिटल इक्सस 265 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन डिजिटल इक्सस 265 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक\nकॅनन डिजिटल इक्सस 265 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये कॅनन डिजिटल इक्सस 265 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक किंमत ## आहे.\nकॅनन डिजिटल इक्सस 265 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकॅनन डिजिटल इक्सस 265 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nकॅनन डिजिटल इक्सस 265 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 8,995)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन डिजिटल इक्सस 265 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन डिजिटल इक्सस 265 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन डिजिटल इक्सस 265 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 346 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन डिजिटल इक्सस 265 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन डिजिटल इक्सस 265 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक वैशिष्ट्य\nअपेरतुरे रंगे F3.6 - F7\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 Megapixels\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nऑप्टिकल झूम 10x to 15x\nमिनिमम शटर स्पीड 1/15 sec\nस्क्रीन सिझे 3 to 4.9 in.\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 461,000 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 0.16875\nकॅनन डिजिटल इक्सस 265 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://shardageorai.blogspot.com/2013/07/blog-post_5495.html", "date_download": "2018-08-18T07:59:41Z", "digest": "sha1:3JDI7MCPF6PYP63LJYVA2DB6CJJNGK6H", "length": 2188, "nlines": 32, "source_domain": "shardageorai.blogspot.com", "title": "Sharda Vidya Mandir Georai", "raw_content": "\nशारदा विद्या मंदिर, गेवराई नेहमीच विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देत असते. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे मुलांच्या मनांतील विचार व्यक्त करण्याचे प्रभावी साधन आहे या चित्रावरून सिद्ध होते.\nश्री. जगदाळे आर. बी.\nआज दिनांक २९ जुलै २०१३ रोजी 'शारदा विद्या मंदिरात...\nप्रशालेतील विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून साकारलेल...\nशारदा विद्या मंदिर, गेवराई नेहमीच विद्यार्थ्यांच्य...\nशारदा विद्या मंदिर गेवराई येथे गुरु पोर्णिमा उत्स...\nदैनिक लोकमत तर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेती...\nशारदा विद्या मंदिर गेवराई येथे दिनांक जून 26, 201...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/amc-mseb-issue-29779", "date_download": "2018-08-18T08:38:16Z", "digest": "sha1:3JLPCGJIAARCYNPO5AVZI6N45KJFACAL", "length": 12886, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "amc & mseb issue महापालिका-महावितरणमध्ये नवा कलगी-तुरा | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 9 फेब्रुवारी 2017\nऔरंगाबाद - महापालिका आणि महावितरणमध्ये वीजबिलावरून चांगलाच कलगी-तुरा रंगत आहे. पथदिवे सुरू करण्यासाठी वीजबिलाचा आग्रह धरणाऱ्या महावितरणला धडा शिकवण्यासाठी महापलिकेने मंगळवारी (ता. सात) रातोरात सर्वेक्षण केले व वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या 400; तर महापालिकेच्या जागेवरच असलेल्या 235 डी. पी. (विद्युत रोहित्र) शोधून काढल्या. एवढ्यावरच न थांबता त्या काढून घेण्यासाठी महावितरणला नोटीस बजावण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत.\nऔरंगाबाद - महापालिका आणि महावितरणमध्ये वीजबिलावरून चांगलाच कलगी-तुरा रंगत आहे. पथदिवे सुरू करण्यासाठी वीजबिलाचा आग्रह धरणाऱ्या महावितरणला धडा शिकवण्यासाठी महापलिकेने मंगळवारी (ता. सात) रातोरात सर्वेक्षण केले व वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या 400; तर महापालिकेच्या जागेवरच असलेल्या 235 डी. पी. (विद्युत रोहित्र) शोधून काढल्या. एवढ्यावरच न थांबता त्या काढून घेण्यासाठी महावितरणला नोटीस बजावण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत.\nगेल्या काही महिन्यांपासून महावितरण आणि महानगरपालिका यांच्यामध्ये कुरघोडी करण्याचा प्रकार सुरू आहे. गेल्या शुक्रवारी (ता. तीन) वीजबिल थकल्याने महावितरणने पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला. शहरात चार दिवस रस्त्यावर अंधार होता. पथदिव्याचा विषय बाजूला पडत नाही, तोच पाणीपुरवठ्याचे थकीत वीजबिल भरण्याचीही महापालिकेला नोटीस बजावण्यात आल्याने पित्त खवळलेल्या महापालिका प्रशासनाने मंगळवारी (ता. सात) डीपीच्या मालमत्ता कराचे सुमारे अडीच कोटी रुपये भरण्याबाबत नोटीस बजावली आहे. याशिवाय सार्वजनिक वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या डीपीचे सर्वेक्षण करण्याचे इमारत निरीक्षकांना आदेश देण्यात आले. त्यानुसार सहा इमारत निरीक्षकांनी अन्य कर्मचाऱ्यांना मदतीला घेऊन रात्रीतून सर्वेक्षण पूर्ण करून बुधवारी (ता. आठ) आयुक्‍तांना अहवाल दिला. या आधारे महावितरणला वाहतुकीला अडथळा ठरणारे डीपी काढून घेण्याबाबत नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nऔरंगाबाद : 'एमआयएम'च्या नगरसेवकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा\nऔरंगाबाद : महापालिकेत एमआयएम नगरसेकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या पाच नगरसेवकांविरोधात शुक्रवारी (ता.17) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयएम नगरसेवक...\nउंड्री - पाचव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजूर ठार\nउंड्री - गुलाम अली नगर गल्ली नं 6 दि.13 ऑगस्ट दु.12.30 वाजता एका निर्माणाधीन इमारतीचे काम सुरू असताना पाचव्या मजल्यावर पडून राजशेखर माशाले (वय 33...\nवाहून गेलेला तरुण तीस तासांनंतरही सापडेना\nजळगाव ः येथील अयोध्यानगराजवळील नाल्याला काल झालेल्या पावसामुळे पूर आला होता. या पुरात इतर नागरिकांना मदत करणारा तरुण पाय घसरून नाल्यात पडून वाहून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.blogspot.com/2014/06/", "date_download": "2018-08-18T09:12:35Z", "digest": "sha1:2QWZRXDQGGINU5OGVJC72TNFUDA3TLQM", "length": 25829, "nlines": 246, "source_domain": "aisiakshare.blogspot.com", "title": "ऐसी अक्षरे: June 2014", "raw_content": "\nचोहीकडे जयघोष झाला बहोत खूब अन् वाहवा मैफलीत या रंग भरण्या 'मंदार' हा आला पहा...\nज्या कारणास्तव मी टीव्ही आणि न्यूजपेपरपासून लांब राहतो, त्याच कारणास्तव मी व्हॉट्सअॅप वापरत नाही. टीव्हीच्या स्क्रीनवर काहीतरी दाखवलं जातंय म्हणून बघत राहणं जसं मला मान्य नाही तसंच कनेक्टीव्हिटीच्या नावाखाली केव्हाही पाठवले जाणारे कुठलेही मेसेज वाचत राहणंही मला झेपत नाही. टचमधे राहण्यासाठी फेसबुक, ई-मेल वगैरे ऑप्शन आहेतच. इन केस ऑफ इमर्जन्सी, व्हॉट्सअॅपच काय, एसेमेसही मला रिलायबल वाटत नाही. फोन लावायचा ना डायरेक्ट तेव्हा व्हॉट्सअॅपवरुन माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असाल तर, सॉरी तेव्हा व्हॉट्सअॅपवरुन माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असाल तर, सॉरी ई-मेल पाठवा, फेसबुकवर पिंग करा, एसेमेस करा, किंवा सरळ फोन लावा आणि बोला... यू आर ऑल्वेज वेलकम ई-मेल पाठवा, फेसबुकवर पिंग करा, एसेमेस करा, किंवा सरळ फोन लावा आणि बोला... यू आर ऑल्वेज वेलकम\nमुंबईच्या चकाला (अंधेरी) स्टेशनवरुन वर्सोव्याला जायचं होतं.\nनविन रिलायन्स मेट्रोच्या घाटकोपर-वर्सोवा रुटवरच चकाला स्टेशन असल्यानं मेट्रो प्रवासाचा चान्स मिळाला.\nचकाला स्टेशनवर लोकलच्या मानानं कमी असली तरी बर्‍यापैकी गर्दी होती.\nतिकीटासाठी रांगेत उभं रहावं लागलं नाही. टच्‌-स्क्रीन किऑस्कवर ती सोय केली होती.\nडेस्टीनेशन वर्सोवा सिलेक्ट केल्यावर मशिननं दहा रुपये मागितले.\nदहाची नोट मशिनमधे टाकली की एक प्रिंटेड रिसीट आणि एक प्लास्टिकचं टोकन बाहेर\nएन्ट्री गेट आपोआप उघडझाप होणारं. गेटवर टोकन ठेवलं की गेट उघडणार.\n(रिलायन्स मेट्रोचं प्रीपेड कार्ड असेल तर टोकन घ्यायची पण गरज नाही. शंभर रुपयांचं रिचार्ज, एक वर्षाची व्हॅलिडिटी. गेटवर टोकनऐवजी कार्ड ठेवलं की गेट उघडणार आणि चकाला स्टेशनची एन्ट्री तुमच्या नावावर. मग जिथं उतरणार त्या स्टेशनवर एक्झिटला कार्ड ठेवलं की त्या स्टेशनपर्यंतचं भाडं कार्डवरुन परस्पर कट. मस्त ना\nमग एन्ट्री झाल्यावर सिक्युरिटी चेक.\nत्यानंतर कुठंही कसलंही चेकींग, कसलीही रांग नाही.\nप्लॅटफॉर्मवर मेट्रो आली की दरवाजे आपोआप उघडतात. आत गेलो की बंद होतात.\nआतमधून मेट्रो पूर्ण एसी\nबाहेरुन वेगवेगळे डबे दिसले तरी आतून सलग पॅसेज. बेंच फक्त दोन बाजूंना, मधे उभं राहण्यासाठी रिकामी जागा. उभं राहताना आधारासाठी बार, सर्कल, हँडल...\nपुढचं स्टेशन कुठलं येणार, याची स्पीकरवरुन अनाऊन्समेंट. शिवाय दरवाजावर त्या स्टेशनच्या नावाचा इंडिकेटर. ज्या बाजूचा दरवाजा उघडणार तिकडचा वेगळा इंडिकेटर.\nवर्सोवा लास्ट स्टेशन. दहाव्या मिनिटाला बाहेर.\nएक्झिट गेटवर प्लास्टिक टोकनसाठी कॉईन-बॉक्ससारखी फट. त्यात टोकन टाकलं की गेट उघडणार. पुन्हा कुठलं चेकींग, टी.सी. काहीच भानगड नाही.\nहेच अंतर बाय रोड जायला म्हणे अर्ध्या-पाऊण तासापेक्षा जास्त वेळ लागतो. मेट्रोनं फक्त दहा मिनिटं.\nशिवाय ती दहा मिनिटंसुद्धा एसीमधे\nमुंबईचा लोकल प्रवासपण असा करता आला तर...\nकाय शिकवायचं आणि काय नाही\nलहानपणापासून, रामानं रावणाला मारलं, पांडवांनी कौरवांना संपवलं, शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, अशा हिंसक गोष्टी संदर्भहीन पद्धतीनं शिकवल्यावर, मोठेपणी गांधीजींचं अहिंसेचं तत्वज्ञान पटण्याची अपेक्षा कशी करता येईल सुष्ट कोण आणि दुष्ट कोण हे कसं आणि कुणी ठरवायचं सुष्ट कोण आणि दुष्ट कोण हे कसं आणि कुणी ठरवायचं पौराणिक व ऐतिहासिक गोष्टींमधला संदर्भ काढून टाकून, फक्त मारामारी आणि भव्यदिव्य युद्धांवर फोकस करणारी 'ब्रेकिंग न्यूज' स्टाईल शिकवण्याची पद्धत बदलली पाहिजे, असं नाही का वाटत पौराणिक व ऐतिहासिक गोष्टींमधला संदर्भ काढून टाकून, फक्त मारामारी आणि भव्यदिव्य युद्धांवर फोकस करणारी 'ब्रेकिंग न्यूज' स्टाईल शिकवण्याची पद्धत बदलली पाहिजे, असं नाही का वाटत युद्धामागची परिस्थिती आणि लॉजिक लक्षात न घेता, प्रत्यक्ष युद्धवर्णनात आपण जास्त रंगून जात नाही ना, याचं भान शिक्षकांनी आणि पालकांनी राखलंच पाहिजे. ज्या धर्मनिरपेक्ष लोकशाही समाजव्यवस्थेत आपण राहतो आहोत तिथल्या शाळांमधून, धर्मांची शिकवण, क्षत्रियाचा धर्म म्हणून 'वध' माफ, मुसलमान 'परके' म्हणून त्यांची कत्तल, अमूक या धर्मातला मोठा नेता, तमूक त्या जातीचा तारणहार, अशा कन्फ्युजिंग आणि मिसलीडिंग गोष्टी वेचून काढून टाकल्या पाहिजेत. आडनावावरुन जात ओळखायचा खेळ आपल्या पिढीपासून तरी बंद केला पाहिजे. शाळा-कॉलेजच्या वर्षांमधे मुलांना कोणत्याही अर्जावर जात-धर्म लिहिण्यापासून परावृत्त केलं पाहिजे. संदर्भहीन इतिहास शिकवण्यापेक्षा, वर्तमान आणि भविष्यात उपयोगी पडेल असं सामाजिक भान - सिव्हिक सेन्स, सहिष्णुता, आपण करत असलेल्या कामाप्रती निष्ठा, प्रामाणिकपणा, अनुकंपा - कम्पॅशन, कला-क्रीडा-विचारांनी आयुष्य समृद्ध बनवण्याचं कौशल्य, अशा कितीतरी गोष्टी पुढच्या पिढीला शिकवल्या पाहिजेत. फुटकळ अस्मितांमधे गुरफटून जाण्याऐवजी, 'आपल्या' देशाप्रती आपल्या जबाबदार्‍या व त्यायोगे उपभोगायला मिळणारं स्वातंत्र्य नि अधिकार जाणून घेणं मुलांसाठी जास्त महत्त्वाचं नाही का युद्धामागची परिस्थिती आणि लॉजिक लक्षात न घेता, प्रत्यक्ष युद्धवर्णनात आपण जास्त रंगून जात नाही ना, याचं भान शिक्षकांनी आणि पालकांनी राखलंच पाहिजे. ज्या धर्मनिरपेक्ष लोकशाही समाजव्यवस्थेत आपण राहतो आहोत तिथल्या शाळांमधून, धर्मांची शिकवण, क्षत्रियाचा धर्म म्हणून 'वध' माफ, मुसलमान 'परके' म्हणून त्यांची कत्तल, अमूक या धर्मातला मोठा नेता, तमूक त्या जातीचा तारणहार, अशा कन्फ्युजिंग आणि मिसलीडिंग गोष्टी वेचून काढून टाकल्या पाहिजेत. आडनावावरुन जात ओळखायचा खेळ आपल्या पिढीपासून तरी बंद केला पाहिजे. शाळा-कॉलेजच्या वर्षांमधे मुलांना कोणत्याही अर्जावर जात-धर्म लिहिण्यापासून परावृत्त केलं पाहिजे. संदर्भहीन इतिहास शिकवण्यापेक्षा, वर्तमान आणि भविष्यात उपयोगी पडेल असं सामाजिक भान - सिव्हिक सेन्स, सहिष्णुता, आपण करत असलेल्या कामाप्रती निष्ठा, प्रामाणिकपणा, अनुकंपा - कम्पॅशन, कला-क्रीडा-विचारांनी आयुष्य समृद्ध बनवण्याचं कौशल्य, अशा कितीतरी गोष्टी पुढच्या पिढीला शिकवल्या पाहिजेत. फुटकळ अस्मितांमधे गुरफटून जाण्याऐवजी, 'आपल्या' देशाप्रती आपल्या जबाबदार्‍या व त्यायोगे उपभोगायला मिळणारं स्वातंत्र्य नि अधिकार जाणून घेणं मुलांसाठी जास्त महत्त्वाचं नाही का हे सगळं पटत असेल तर, सरकारनं सिलॅबस बदलावा - शाळेनं शिक्षक बदलावेत, वगैरे शेळ्या न हाकता, तुम्ही काय कराल, हे उंटावरुन खाली उतरुन सांगा. मी स्वतः तर करतोच आहे, तुम्हालाही काही करावंसं वाटलं तर या. खूप हातांची आणि डोक्यांची गरज आहे इथं. शेवटी प्रश्न नवी पिढी घडवण्याचा आहे ना\nकाय शिकवायचं आणि काय नाही\n\"जात ही मनाची अवस्था किंवा वृत्ती आहे. जातिविनाश म्हणजे भौतिक बंधनांचा विनाश नव्हे. जातिविच्छेद म्हणजे मनोवृत्तीतील परिवर्तन... हिंदू जातिभेद पाळतात कारण ते बुद्धिहीन वा अमानुष आहेत म्हणून नव्हे, तर ते धर्मपरायण असल्यामुळे याला त्यांच्या मनात जातीय वृत्ती रूजविणारा धर्म जबाबदार आहे. खरा शत्रू जातिभेद पाळणारे लोक नसून त्यांना तो धर्म पाळावयास शिकविणारी शास्त्रे आहेत. त्यामुळे शास्त्रप्रामाण्यावरील श्रद्धा नष्ट करणे हाच खरा उपाय आहे. लोकांच्या श्रद्धा व मते यांची जडणघडण शास्त्रे करीत असताना आणि त्यांचा लोकांच्या मनावरील पगडा कायम असताना तुम्हाला यशाची अपेक्षा कशी करता येईल याला त्यांच्या मनात जातीय वृत्ती रूजविणारा धर्म जबाबदार आहे. खरा शत्रू जातिभेद पाळणारे लोक नसून त्यांना तो धर्म पाळावयास शिकविणारी शास्त्रे आहेत. त्यामुळे शास्त्रप्रामाण्यावरील श्रद्धा नष्ट करणे हाच खरा उपाय आहे. लोकांच्या श्रद्धा व मते यांची जडणघडण शास्त्रे करीत असताना आणि त्यांचा लोकांच्या मनावरील पगडा कायम असताना तुम्हाला यशाची अपेक्षा कशी करता येईल धर्मशास्त्रप्रामाण्यास स्वत: आव्हान द्यायचे नाही, लोकांना शास्त्रांच्या आज्ञांवर विश्वास ठेवू द्यायचा आणि पुन्हा त्यांच्या वागणुकीवर व कृतींवर अमानुष, अविवेकी अशा विशेषणांनी टीका करायची, हा समाजसुधारणेचा मार्ग विपरीतच म्हटला पाहिजे. श्रीमान गांधींसकट कुणीही ही गोष्ट लक्षात घेतलेली दिसत नाही की, लोकांच्या कृती म्हणजे शास्त्रांचा त्यांच्या मनावर झालेल्या संस्कारांचा परिपाक होय. त्यामुळे त्यांची वागणूक ज्या शास्त्रांवर आधारित आहे त्या शास्त्रांवरील विश्वास उडाल्यावाचून ते आपले वर्तन बदलणार नाहीत. म्हणून समाजसुधारकांचे सर्व प्रयत्न फसले यात नवल नाही... धर्मशास्त्रांच्या जोखडातून प्रत्येक स्त्री-पुरुषास मुक्त करा. म्हणजे मग पहा, ते स्वत:च सहभोजन व आंतरजातीय विवाह करतात की नाही धर्मशास्त्रप्रामाण्यास स्वत: आव्हान द्यायचे नाही, लोकांना शास्त्रांच्या आज्ञांवर विश्वास ठेवू द्यायचा आणि पुन्हा त्यांच्या वागणुकीवर व कृतींवर अमानुष, अविवेकी अशा विशेषणांनी टीका करायची, हा समाजसुधारणेचा मार्ग विपरीतच म्हटला पाहिजे. श्रीमान गांधींसकट कुणीही ही गोष्ट लक्षात घेतलेली दिसत नाही की, लोकांच्या कृती म्हणजे शास्त्रांचा त्यांच्या मनावर झालेल्या संस्कारांचा परिपाक होय. त्यामुळे त्यांची वागणूक ज्या शास्त्रांवर आधारित आहे त्या शास्त्रांवरील विश्वास उडाल्यावाचून ते आपले वर्तन बदलणार नाहीत. म्हणून समाजसुधारकांचे सर्व प्रयत्न फसले यात नवल नाही... धर्मशास्त्रांच्या जोखडातून प्रत्येक स्त्री-पुरुषास मुक्त करा. म्हणजे मग पहा, ते स्वत:च सहभोजन व आंतरजातीय विवाह करतात की नाही.... शास्त्रप्रामाण्य धुडकावण्याची भगवान बुद्धाने जी भूमिका स्वीकारली ती तुम्ही स्वीकारा.... शास्त्रप्रामाण्य धुडकावण्याची भगवान बुद्धाने जी भूमिका स्वीकारली ती तुम्ही स्वीकारा\n- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'दि अॅनहिलेशन ऑफ कास्ट' या पुस्तकातून\nमाणूस आहे तोपर्यंत सगळं आहे.\nमग कसला जय नि कसला पराजय.\nकसलं राजकारण, कसली निवडणूक.\nकसली सत्ता, कसलं पद.\nकसले मनसुबे, कसले डावपेच.\nमाणूस आहे तोपर्यंत सगळं आहे.\nमाणूस गेला की संपलं सगळं\nदंगलीच्या अफवा, दहशतीचं वातावरण, व्यक्तिगत नि व्यावसायिक नुकसानीतून होणारी चिडचिड... या सगळ्यावर उतारा म्हणजे कालची उषाकुमारींची गझल मैफल - कलंदरी. उषाकुमारींच्या स्वरचित मराठी गझलांचं शास्त्रीय संगीतावर आधारीत सादरीकरण. पुण्यातल्या उद्यान प्रसाद हॉलमधे. उषाकुमारी रचित माझ्या या आवडत्या रुबाईशिवाय निवेदन पूर्ण कसं झालं असतं...\nकायमचे धडधडणारे मन शांत करावे क्षणभर कोणी\nजहरामधले जहरीलेपण कमी करावे क्षणभर कोणी\nएक एक एकटेपणाच्या लाटा मजवर करीती हल्ला\nचंद्रकिनारी चंद्रकमानीमधून यावे क्षणभर कोणी\nधर्म आणि जात या कृत्रिम गोष्टींनी माणसाचं पार माकड करुन टाकलंय. किती शिकण्यासारखं आहे जगात. किती फिरण्यासारखं आहे. केवढी पुस्तकं आहेत वाचलीच पाहिजेत अशी. किती सिनेमे आहेत बघितलेच पाहिजेत असे. किती गाणी आहेत गुणगुणावीतच अशी. केवढी माणसं आहेत भेटलीच पाहिजेत अशी. आणि माणूस काय करतोय तर, माझा धर्म श्रेष्ठ का तुझा, माझी जात वरची का तुझी... कशी संपवायची ही जात कसं सोडवायचं माणसाला धर्माच्या कचाट्यातून कसं सोडवायचं माणसाला धर्माच्या कचाट्यातून मला जे सुचतंय ते मी करतोयच. तुम्हीही विचार करा आणि सांगा अजून काय करता येईल...\nदुकानासाठी सामान खरेदी करत लक्ष्मी रोडवरुन कोथरुडकडं येत होतो.\nदुकानातून फोन आला, कोथरुडला कसलीतरी दंगल झालीय, सगळी दुकानं बंद करायला लावलीत.\nकोथरुडात येईपर्यंत तरी काही वेगळं जाणवत नव्हतं.\nकरिश्मा सोसायटीपासून मात्र दुकानं बंद-बंद दिसू लागली.\nपुढच्या चौकातल्या पुतळ्याकडं लक्ष गेलं. दंगल म्हटलं की पुतळा आठवलाच पाहिजे ना.\nनाही नाही, शिवाजी महाराजांचा नव्हता\nयाची कोण काय विटंबना करणार आणि केलीच तर त्यासाठी कोण दंगा करणार\nपुढच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडं पण नीट बघितलं.\nपुतळा ठीक होता, पण खाली खूप माणसं जमली होती.\nभगवे झेंडे घेतलेली, भगवे नाम ओढलेली तरुण माणसं.\nशिवसेनेच्या कार्यालयाबाहेर गंभीर चेहर्‍यानं गर्दी करुन उभी होती.\nपुढं-पुढं सगळीच दुकानं बंद दिसत होती.\nदुकानात आलो. शटर उघडलं. काम चालू केलं.\nशेजारुन माहिती मिळाली - काल रात्री कुणीतरी कुठंतरी शिवाजी महाराजांची आणि बाळासाहेब ठाकरेंची विटंबना केली म्हणे. त्यामुळं कोथरुडात पण दंगा झाला. मुसलमानांची दुकानं-बिकानं फोडली म्हणे.\nआमचं दुकान सोडून बाकी सगळी दुकानं बंद होती. कस्टमर येत होते.\nथोड्या वेळानं आठ-दहा बाईक्सवरुन वीस-पंचवीस पोरं आरडाओरडा करत, घोषणा देत निघून गेली.\nत्यामागोमाग तीन-चार गाड्यांवरुन काही टगे आले.\nबंद कर रे शटर, कळत नाय का सगळं बंद आहे. चल रे, बंद कर दुकान, बंद कर\nचेहर्‍यावर भाव काहीतरी महान देशकार्य करतोय असे. इतर वेळी चेहर्‍यावरची माशीपण उडणार नाही, पण आत्ता माज, मग्रूरी अगदी ओसंडून वाहतीय.\nबंद केलं शटर... थोड्या वेळासाठी.\nआणखी काय करता येईल\nया ब्लॉगवरील नवे लिखाण ई-मेलद्वारे मिळवाः\nकाय शिकवायचं आणि काय नाही\nया ब्लॉगवरचे विचार आणि शब्द मुक्त आहेत. तुम्ही वाचा आणि इतरांनाही वाचू द्या. - मंदार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/sanjay-miskin-article-notabandhi-18871", "date_download": "2018-08-18T08:43:09Z", "digest": "sha1:OPV7SHHBT62GUVKIEKE2LGKKG26D5LJY", "length": 49803, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "sanjay miskin article on notabandhi 'नोटबंदी'तही भाजपलाच 'संधी' (संजय मिस्कीन) | eSakal", "raw_content": "\n'नोटबंदी'तही भाजपलाच 'संधी' (संजय मिस्कीन)\nरविवार, 4 डिसेंबर 2016\nनगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकांत भारतीय जनता पक्षानं मुसंडी मारली आहे. केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारच्या अडीच वर्षांची, तर देवेंद्र फडणवीस सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीचं मूल्यमापन करणारी महाराष्ट्रातली ही पहिलीच मोठी निवडणूक...त्यातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेली नोटबंदी, त्याअगोदर सहा-सात महिने जातीजातीच्या मोर्चांनी ढवळून निघालेलं सामाजिक वातावरण व सरकारची भूमिका यांचं प्रतिबिंब अधोरेखित करणारी निवडणूक म्हणून या निवडणुकीकडं पाहिलं जात होतं.\nनगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकांत भारतीय जनता पक्षानं मुसंडी मारली आहे. केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारच्या अडीच वर्षांची, तर देवेंद्र फडणवीस सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीचं मूल्यमापन करणारी महाराष्ट्रातली ही पहिलीच मोठी निवडणूक...त्यातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेली नोटबंदी, त्याअगोदर सहा-सात महिने जातीजातीच्या मोर्चांनी ढवळून निघालेलं सामाजिक वातावरण व सरकारची भूमिका यांचं प्रतिबिंब अधोरेखित करणारी निवडणूक म्हणून या निवडणुकीकडं पाहिलं जात होतं. मात्र, अखेर सगळ्याच बाजूंनी प्रतिकूल वाटणाऱ्या स्थितीवर भाजपनं मात केली आणि स्वबळावर पहिल्यांदाच लढत असताना ५१ नगरपालिकांमध्ये यश खेचून आणलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीला जनतेनं कौल दिल्याचं मानलं गेलं. राज्यातला सर्वाधिक मजबूत पक्ष म्हणून नावाजलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची मात्र घसरगुंडी झाली. केवळ स्थानिक शिवसैनिकांच्या जोरावर शिवसेनेलाही मोठं यश मिळालं, तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिल्याचं आश्‍चर्यदेखील व्यक्त होऊ लागलं.\nया निवडणुकीचा राजकीय, सामाजिक व आर्थिक अंगानं घेतलेला हा वेध...\n‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक प्रश्‍नावर लढल्या जातात,’ हा इतिहास मोडीत काढणाऱ्या नगरपालिका व नगर पंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. केंद्रात व राज्यात विजयाचा वारू उधळलेल्या भारतीय जनता पक्षाला तशा या निवडणूक नवीनच होत्या. कारण, याअगोदर भाजपचा फारसा बोलबाला या निवडणुकांमध्ये नसायचाच. ज्या स्थानिक आघाडीसोबत जुळेल तिथं आपली चार-दोन माणसं निवडून आणणं अथवा शिवसेनेसोबत घरोबा करून सत्तेचं समीकरण जुळवणं एवढाच सोपस्कार भाजप पार पाडत होता. मात्र, यंदा पहिल्यांदाच ‘शत-प्रतिशत’चं ब्रीद घेऊन मैदानात उतरलेल्या भाजपनं या निवडणुका अत्यंत प्रतिष्ठेच्या केल्या. विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी तर या निवडणुका म्हणजे ‘कामगिरीचा ताळेबंद’ मांडायला लावणारी वार्षिक परीक्षाच..\nकेंद्रानं केलेली ‘नोटबंदी’...तिच्यामुळं सामान्य नागरिकांना होणारा त्रास... आर्थिक उलाढालीच्या नादात धावणारी ही शहरं...पण नोटबंदीनं ती रांगेतच उभी केली... प्रत्येक नागरिक एका रात्रीत ‘कॅशलेस’ झाल्याचं विचित्र चित्र... खिशातल्या ५०० व एक हजार मूल्याच्या नोटांची शून्य किंमत... पण तरीही ५१ शहरांत नागरिकांनी भाजपला कौल दिला. थेट नगराध्यक्षपदाचा लाभ भाजपला झाला, तर नगरसेवकांच्या संख्येत कायम ३०० च्या खाली असलेल्या भाजपनं तब्बल ८९३ जागा पटकावल्या. अर्थातच यशाचं सगळं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच मिळालं.\nनोटबंदीची ताज्या व ‘व्यावहारिक’ राजकीय समस्येच्या विवंचनेत पार पडलेल्या या निवडणुकीतही नागरिकांनी ‘कमळ’ पसंत केलं, हे नाकारता येणार नाही. त्यातच राज्यातल्या जातीजातीच्या मोर्चांनी सगळं सामाजिक वातावरण ढवळून काढलेलं होतंच. केंद्रातल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची अडीच वर्षं, तर राज्यातल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची दोन वर्षं यांचा ताळेबंद मांडणारी ही निवडणूक मानली गेली होती. या निवडणुकीत बाजी नरेंद्र मोदी यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनीही मारली. ‘भाजप नंबर एक’चा पक्ष म्हणून नगरपालिकांमध्ये उदयाला आला.\nमात्र, ज्या काँग्रेसला पराभूत मानसिकतेनं अजूनही ग्रासलेलं आहे, त्या काँग्रेसनं आश्‍चर्यकारकरीत्या दुसरा क्रमांक पटकावला. नगराध्यक्षपदाच्या बाबतीत शिवसेना दुसऱ्या क्रमाकांवर राहिली; पण नगरसेवकांच्या संख्येत मात्र शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. ‘महाराष्ट्रातल्या राजकारणातला शक्तिशाली पक्ष’ म्हणून नाव असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचं मात्र पुरतं ‘पानिपत’ झालं.\nया निवडणुकांमध्ये भाजप सर्वोच्च स्थानी दिसत असला, तरी भाजपचं हे यश तसं चौफेर असल्याचं मानता येणार नाही. संख्याबळानं ५१ नगराध्यक्ष असले, तरी विदर्भ व पुणे विभागात भाजपचे ३८ नगराध्यक्ष आहेत. मराठवाडा, कोकण व उत्तर महाराष्ट्रात भाजपला तितक यश मिळालेलं नाही. याचाच अर्थ केवळ या निवडणुकीवर नोटबंदी व जातीय समीकरणांची कोणतीही छाप पडलेली नाही. केवळ प्रचाराची यंत्रणा, सत्तेतला पक्ष आणि मोदी व फडणवीस यांचा विकासाचा दृष्टिकोन या त्रिसूत्रीलाच मतदारांनी अधिक कौल दिल्याचं प्रथमदर्शनी मान्य करावं लागेल. शहरी भागातल्या मतदारांवर या दोन्ही नेत्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आहे, ही भाजपसाठी जमेची बाजू.\nया नगरपालिका म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर अवलंबून असलेली शहरं आहेत. आजूबाजूचे शेती-आधारित व्यवहार व उत्पादनावरच या शहरांची आर्थिक घडी बसलेली असते. ग्रामीण भागातल्या नाराजीचे पडसाद या निवडणुकीत उमटतील, अशीही अटकळ बांधली जात होती; पण ती सपशेल फोल ठरली. या निवडणूक निकालांनी भाजपला अधिकचं बळ येणार आहे. कार्यकर्त्यांचं आत्मबल वाढणार आहे; पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मागं असलेलं पंतप्रधान मोदी यांचं पाठबळ अधिकच दृढ होणार हे नाकारता येणार नाही.\nकोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सत्ताधारी पक्षाला लाभदायकच ठरतात. या वेळीही तेच झालं. भाजप व शिवसेना या दोन्ही सत्तेतल्या पक्षांना १४७ पैकी ७६ ठिकाणी नगराध्यक्षपदी यश आलं आहे. भाजपनं स्थानिक सत्तेत मुसंडी मारली. त्यासाठी फडणवीस यांनी राज्यभर प्रचाराचा धुराळा उडवून दिला होता. भाजपचे सगळेच मंत्री प्रत्येक जिल्ह्यात तळ ठोकून होते. प्रत्येक मंत्र्याकडं तीन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आलेली होती. विधानसभा निवडणुकीत जसा प्रचार केला जातो, अगदी त्याच धर्तीवर प्रचाराची यंत्रणा राबवली गेली. शहरी मतदाराला उत्तम प्रशासन अन्‌ पारदर्शक प्रशासन या दोन बाबी कायम भावतात. त्याचाही लाभ भाजपला झालाच; पण, त्यासोबतच शिवसेनेलाही मोठ्या प्रमाणात यश मिळाल्यानं या निवडणुका सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावरच पडतात, हा सिद्धान्त पुन्हा एकदा स्पष्ट झाला.\nराज्यातल्या विपरीत परिस्थितीत भाजप व शिवसेनेला जनतेनं कौल दिला. मराठा आरक्षणाचा फायदा तोटा, नोटबंदीचे पडसाद या राजकीय व आर्थिक बाबींची समीकरणं मांडली जात असली, तरी हा ‘फॅक्‍टर’ तसा फारसा प्रभावी ठरला नाही, हे मान्यच करावं लागेल.\nया निवडणुकांमध्ये महत्त्वाची बाब म्हणजे, शिवसेनेला नगराध्यक्षपदी मिळालेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या २५ जागा. प्रचारात शिवसेना कुठंच दिसत नव्हती. उद्धव ठाकरे यांनी एकही सभा घेतली नाही. स्थानिक शिवसैनिकांवरच शिवसेनेची सर्व भिस्त होती. कॅबिनेट मंत्र्यांपैकी एकनाथ शिंदे यांनी काही जिल्ह्यांत सभा घेतल्या. ‘कटप्पानं बाहुबलीला का मारलं’ यापेक्षा गंभीर प्रश्‍न विचारला जात आहे व तो म्हणजे ‘शिवसेनेनं कॅबिनेट मंत्र्यांना प्रचाराच्या मैदानात का नाही उतरवलं..’ यापेक्षा गंभीर प्रश्‍न विचारला जात आहे व तो म्हणजे ‘शिवसेनेनं कॅबिनेट मंत्र्यांना प्रचाराच्या मैदानात का नाही उतरवलं..’ असा गमतीशीर मेसेज निवडणुकीच्या निकालानंतर गाजत होता. मराठा आंदोलनाची ‘सामना’तून उडवली गेलेली खिल्ली, त्यानंतर रंगलेलं माफीनाम्याचे राजकीय नाट्य यामुळं शिवसेना या निवडणुकांत काही प्रमाणात बॅकफूटवरच होती; पण २५ शहरांत थेट नगराध्यक्षपदी शिवसेनेला संधी मिळाली. मतदारांनी पुन्हा एकदा सत्तेतल्या पक्षाला साथ दिल्याचंच हे द्योतक मानावं लागेल. नगरसेवकांच्या संख्येत शिवसेना मात्र चौथ्या स्थानी राहिली; पण नगराध्यक्षपदाच्या बाबतीत मात्र दुसऱ्या स्थानी हेही विशेषच.\nया निवडणुकांनी काँग्रेसची सुप्त शक्‍ती आजही कायम असल्याची चुणूकसुद्धा दाखवली. ‘एमआयएम’ पक्षाचा फॅक्‍टर नसता तर काँग्रेसनं कदाचित भाजपची बरोबरी केली असती. अत्यंत विपन्नावस्थेतल्या काँग्रेसला भविष्यात मतांचं समीकरण जुळवताना प्रचंड कसरत करावी लागणार, हे संकेत नगरपालिकांच्या या निवडणुकांनी दिले आहेत. दलित व मुस्लिम हा परंपरागत मतदार काँग्रेसपासून तुटला आहे. दलित मोठ्या प्रमाणात भाजपसोबत गेल्याचं चित्र आहे, तर मुस्लिम मतदारांनी एमआयएम पक्षाला सर्वाधिक पसंती द्यायला सुरवात केल्याचं नाकारता येत नाही. काँग्रेसनं या निवडणुकांत परंपरागत पद्धतीचा प्रचार केला. मोदी सरकारच्या विरोधात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचे सगळेच नेते टीका करत होते. ‘अच्छे दिन’ या एका वाक्‍याच्या भोवतीच काँग्रेसच्या प्रचाराचं सूत्र होतं. नेत्यांमधली कुरघोडी परंपरेप्रमाणे कायम होती, तरीही मतदारांनी काँग्रेसला दुसऱ्या स्थानी पसंती दिली. काँग्रेसचे ७२७ नगरसेवक निवडून आले. सगळ्याच स्तरांवर मरगळ असतानाही स्थानिक पातळीवर काँग्रेसची ताकद शिवसेना व राष्ट्रवादीपेक्षा अधिक आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं हे नाकारता येणार नाही.\nया निवडणुकीनं राष्ट्रवादीच्या भविष्यातल्या अस्तित्वाविषयी विचार करायला लावणारे संकेत दिले आहेत. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीची ताकद कायम अधिक असल्याचं चित्र राज्यभरात दिसतं; पण या वेळी राष्ट्रवादीला सर्वाधिक फटका बसल्यानं पक्षातल्या युवा कार्यकर्त्यामध्ये प्रचंड नैराश्‍याचं वातावरण आहे. मराठवाडा वगळता राष्ट्रवादीचे सर्व बालेकिल्ले उद्‌ध्वस्त झाले आहेत. राष्ट्रवादीचा गड मानल्या जाणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपनं जोरदार मुसंडी मारत दिग्गजांच्या ताब्यातल्या नगरपालिकांमध्ये कमळ फुलवलं आहे. या निवडणुकांत राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा सर्वस्वी अजित पवार यांच्यावरच होती. छगन भुजबळ तुरुगांत असल्यानं उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा धुव्वा उडाला. पुणे विभागात राष्ट्रवादीला केवळ एकच नगराध्यक्ष मिळाला, तर भाजपनं १२, तर शिवसेनेनं सात नगराध्यक्षपदं पटकावली.\nराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कधीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारात उतरत नाहीत; पण या वेळी खासदार सुप्रिया सुळेदेखील प्रचारात उतरल्या नव्हत्या. स्थानिक नेत्यांच्या भरोशावरच राष्ट्रवादीची मदार होती; पण त्यात राष्ट्रवादीला यश आलं नाही. मित्रपक्ष काँग्रेसशी कायम स्पर्धा करण्याच्या नादात राष्ट्रवादीला या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. काँग्रेसपेक्षा सुमारे सव्वाशे नगरसेवक कमी असल्यानं आगामी काळात दोन्ही पक्षांना आघाडीच्या बंधनात बांधावं, असा सूर कार्यकर्त्यांमध्ये आहे. एकंदर, या नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळालं ते भ्रष्टाचारमुक्‍त प्रशासनाच्या कारभारामुळं. भाजपच्या अनेक मंत्र्यांवर आरोप असले तरी नरेंद्र मोदी यांची प्रतिमा आजही शहरी मतदारांना भुरळ घालत आहे. विदर्भात भाजपची ताकद कायम राहिली आहे, तर काँग्रेसची ताकद घटली आहे. मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतल्यानंतर फडणवीस यांनी विदर्भातले सर्व प्रकारचे अनुशेष भरून काढण्याचे जे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत, ती जमेची बाजू आहे. ‘विदर्भप्रेमी मुख्यमंत्री’ ही त्यांची प्रतिमा कायम आहे. शहरी विकास निधीसाठी फडणवीस यांच्यावर विदर्भातल्या जनतेचा विश्‍वास आहे; पण विरोधात असताना पश्‍चिम महाराष्ट्रावर कायम टीकास्त्र सोडून स्वतंत्र विदर्भाची भाषा बोलणाऱ्या फडणवीस यांच्या नेतृत्वाला या निवडणुकीत पश्‍चिम महाराष्ट्रातल्या जनतेनंही कौल दिल्याचं नाकारता येत नाही. पुणे व नाशिक या दोन्ही सधन जिल्ह्यांमध्ये भाजपला १८ शहरांतल्या जनतेनं थेट कौल दिला आहे.\nराज्यातल्या सगळ्याच पक्षांतल्या नेतृत्वांमध्ये सध्या फडणवीस यांच्या नेतृत्वाकडं युवा मतदारांचा अधिक कौल असल्याचं या निकालातून स्पष्ट होतं. शहरातल्या मध्यमवर्गीय मतदारांवर प्रभाव पाडेल, असं नेतृत्व इतर कोणत्याही पक्षाकडं सध्या तरी दिसत नाही. राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या नेतृत्वाविषयी टीकेचा सूर कायम आहे, तर काँग्रेस विरुद्ध भाजप या लढाईत शहरी भागात भाजपचीच सरशी होत असल्याचं चित्र आहे.\nया निवडणुकीचा सगळ्यात प्रभावी भाग म्हणजे, स्थानिक पातळीवरची ही निवडणूक असली, तरी ती राजकीय पक्षांच्या प्रभावावर आधारित राहिली, असं म्हणावं लागेल. याअगोदर बहुतांश ठिकाणी स्थानिक आघाड्या करून निवडणुका पार पडत. सर्वपक्षीय स्थानिक आघाड्या यंदा पहिल्यांदाच फारशा शहरात झाल्याचं दिसलं नाही. राज्यातले चारही प्रमुख पक्ष स्वबळावरच निवडणुकीला सामोरे गेले. त्यात सत्ताधारी भाजपनं प्रचारात प्रचंड मोठी आघाडी घेतली. त्याचा लाभही त्यांना झाला.\nसर्वाधिक लक्षवेधी लढत परळी नगरपालिकेची ठरली. पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा हा सरळ सामना अखेर सत्ता असतानाही पंकजा यांना जिंकता आला नाही. मुख्यमंत्र्यांची सभा झाली. पंकजा यांनी तळ ठोकून प्रचार केला. भगवानगडावरच्या वादातून निर्माण झालेली सहानुभूतीची लाट पंकजा यांना मतांमध्ये रूपांतरित करता आलेली नाही. धनंजय मुंडे यांचा प्रभाव कायम राहिल्यानं या मतदारसंघात आगामी विधानसभा रंगतदार होईल, असंच चित्र आहे.\nकराड नगरपालिकेची निवडणूकदेखील अशीच रंगतदार झाली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या नगरपालिकेची धुरा सांभाळली होती. नगरपालिकेत काँग्रेसला बहुमत मिळालं; पण नगराध्यक्षपद मात्र गमावावं लागले. एमआयएमच्या उमेदवारामुळं इथं काँग्रेसचा नगराध्यक्ष पराभूत झाल्याचं स्पष्ट झालं. बुलडाण्याची सत्ताही काँग्रेसला एमआयएम फॅक्‍टरमुळंच गमावावी लागली.\nसांगली-इस्लामपूरमध्येही राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाला भाजपनं पराभूत केलं. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पुतण्यानं शिवसेनेत प्रवेश केल्यानं रोह्याची निवडणूकदेखील रंगतदार झाली. अखेर राष्ट्रवादीचा उमेदवार जेमतेम सहा मतांनी जिंकला व प्रदेशाध्यक्ष तटकरे यांना त्यातच समाधान मानावं लागलं.\nराज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी या विरोधी पक्षांवर मतदारांचा राग आजही कायम असल्याचं या निवडणुकांमुळं दिसून आलं. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातच काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानं त्या पक्षात खळबळ माजली आहे.\nया निवडणुकीत सामाजिक व जातीय समीकरणांचा फारसा प्रभाव पडला नसल्यानं राज्याच्या राजकारणाची दिशा ही केवळ विकास व पारदर्शक कारभाराच्या दिशेनं सुरू असल्याचं दिसतं. फडणवीस यांच्या नेतृत्वातल्या सत्तेवर मतदारांचा विश्‍वास आहे, असंच म्हणावं लागेल. नोटाबंदीचा त्रास भोगावा लागत असूनही मतदारानं भाजप सरकारला संधी दिली आहे. त्यामुळं काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही विरोधी पक्षांना आगामी राजकीय निवडणुकांमध्ये आत्मचिंतन करण्याची गरज आहे.\nराज्यात गेली चार वर्षं दुष्काळ होता. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण मोठं होतं. देशभर या दुष्काळाचे पडसाद उमटले होते. जनतेत सरकारच्या कार्यपद्धतीविषयी रोष होता; पण नगरपालिका निवडणुकांत त्याचं प्रतिबिंब पडलं नाही. मात्र, विधानसभा व लोकसभेत भाजपची ज्या प्रकारची लाट होती, तेवढी लाट आज प्रभावी राहिली नाही, हेदेखील नाकारता येणार नाही. विदर्भ हा भाजपचा परंपरागत बालेकिल्ला वगळता इतर विभागांत भाजपला आगामी काळात यशासाठी संघर्षच करावा लागणार आहे.\nफडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपची घोडदौड सुरू असली, तर त्यांचा कट्‌टर प्रतिस्पर्धी पक्ष शिवसेनादेखील त्याच मार्गानं यश गाठत आहे. शहरात भाजपला मानणारा मतदार अधिक असल्यानं हे यश दिसतं; पण आगामी जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांची खरी कसोटी लागणार आहे. नोटबंदीचा खरा फटका ग्रामीण भागालाच बसला आहे; त्यामानानं शहरी नागरिकांना तो तेवढा बसलेला नाही.\nभाजपनं नगरपालिकांमध्ये मुसंडी मारलेली असली, तरी खरी अडचण नगरपालिकांचा कारभार करताना येणार आहे. थेट नगराध्यक्षपदाची निवड हा भाजपचा फॉर्म्युला यशस्वी झाला आहे; पण अनेक नगरपालिकांमधली सत्ता इतर पक्षांकडं आहे. नगराध्यक्ष एका पक्षाचा व नगरपालिकेत बहुमत अन्य पक्षाचं यामुळं कायम संघर्षाचं वातावरण राहील, ही भीती आहे. या सत्तासंर्घषातून नगरविकासाची कामं रेंगाळतील व शहरांचा विकास मंदावेल हेही तितकंच खरं. त्यासाठी फडणवीस यांच्या दरबारी नगरपालिकेच्या तक्रारींचा नवा विषय रोज समोर येण्याची शक्‍यता आहे.\nजातीय समीकरणांचा आढावा घेतला तर काँग्रेससाठी आगामी काळ मोठा जिकिरीचा ठरेल, तर राष्ट्रवादीला आता अस्तित्वाचीच लढाई करावी लागणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या भरोशावर राष्ट्रवादीचे नेते विसंबून होते; पण, मराठा क्रांती मोर्चानं या निवडणुकीत राजकीय प्रभाव पाडलेला नाही, हेही सिद्ध झालं आहे. त्यामुळं, सगळ्याच जातींच्या आरक्षण-आंदोलनाची धास्ती हे सरकारच्या मानेवरचं जोखड होत नाही, असा एक आत्मविश्‍वास वाढण्यास भाजपला मदत होण्याचे संकेत आहेत. केवळ विकासाचा अजेंडा व विश्‍वासू नेतृत्वाचा चेहरा यावरच मतदार कौल देतात, ही भाजपसाठी जमेची बाजू राहणार आहे.\nया निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मात्र मोठा दणका बसला आहे. राज्यभरात या पक्षाचे केवळ सात नगरसेवक विजयी झाले आहेत. या पक्षाचं अस्तित्वच या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये उरलं नसल्याचं चित्र आहे. पक्षस्थापनेनंतर मनसेनं राज्यातली वणी (यवतमाळ) महापालिका जिंकली होती. आता या महापालिकेतही मनसेला सत्ता टिकवता आलेली नाही.\n‘एकंदर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या त्या त्या शहरातल्या स्थानिक विषयावर आधारित असतात,’ हे समीकरण या वेळी मोडीत निघालं आहे. राजकीय पक्ष व त्या पक्षाची प्रतिमा यावरच सर्व पालिकांमध्ये निवडणूक लढली गेली. नेतृत्वाचा चेहरा व विकासाचा अजेंडा यावरच मतदारांनी कौल दिला. या सगळ्याच क्षेत्रांत भारतीय जनता पक्षानं बाजी मारली. आतापर्यंत केंद्र व राज्याची सत्ता काबीज करणाऱ्या भाजपनं या वेळी स्थानिक पातळीवरही सत्ताकेंद्रं स्थापन करण्यात यश मिळवलं. याचा फायदा सगळ्याच आगामी निवडणुकांत होईल, यासाठी फडणवीस हे सत्तेचा सदुपयोग करतील. भाजपचा परंपरागत शहरी मतदार कायम राहील, यासाठी शहरविकासाची दिशा कायम ठेवावी लागेल. नगराध्यक्ष व नगरपालिकांतला संघर्ष राजकीय प्रगल्भतेनं सोडवून राजकीय बजबजपुरीत शहरांच्या पालिकांचा कारभार लटकणार नाही, याची काळजी त्यांना घ्यावी लागेल. त्याच प्रकारे विरोधकांच्या पालिकेत भाजपच्या नगराध्यक्षाला झुकतं माप देत या स्थानिक स्वराज्य संस्थामधला लोकशाहीचा पाया खचणार नाही, याचीही काळजी मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागणार आहे.\nपंकज भूसे यांचा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव\nसरळगांव - महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी होऊन दिलेल्या उद्दिष्टा पेक्षा जास्त वृक्ष लागवड करून उत्कृष्ट कामगिरी केल्याने...\nऔरंगाबाद : 'एमआयएम'च्या नगरसेवकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा\nऔरंगाबाद : महापालिकेत एमआयएम नगरसेकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या पाच नगरसेवकांविरोधात शुक्रवारी (ता.17) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयएम नगरसेवक...\nचिंचवडमध्ये रविवारी रंगणार महिला प्रेरणा संमेलन\nवाल्हेकरवाडी - स्वयंसिद्धा प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड शहर) आणि प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि. 19 ऑगस्ट) चिंचवड...\nदूध भुकटी उद्योग संकटात ; शेतकऱ्यांना वाढीव दराची प्रतीक्षाच\nसोलापूर : दूध व दुग्धजन्य पदार्थांची देशांतर्गत गरज भागवून शिल्लक दुधापासून भुकटी बनविली जाते. परंतु, सद्यःस्थितीत महाराष्ट्रात 30 हजार टन तर...\nपंतप्रधानांकडून केरळसाठी 500 कोटींची मदत जाहीर\nतिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://sanvaad.blogspot.com/2008/10/blog-post.html", "date_download": "2018-08-18T08:35:41Z", "digest": "sha1:B3F45X52A3PVY4X35Z7MKQ2UWHRRENFU", "length": 26865, "nlines": 158, "source_domain": "sanvaad.blogspot.com", "title": "संवाद: रखडलेलं लिखाण", "raw_content": "\nमाझ्या मनातला सातत्याने चाललेला विचारांचा प्रवास...माझ्यातल्या चाकोरीबाहेरच्या नव्या जाणिवा, नव्या सृजनाची जाण...त्याची अभिव्यक्ति म्हणजेच हा संवाद...मर्मबंधातली ठेव ही\nहे लिहायचं बरेच दिवस मनात आहे आणि या ना त्या कारणाने राहूनच जातय...\nशेवटी आज मुहूर्त सापडलेला दिसतोय दिसतोय म्हणण्याचं कारण, म्हण़जे आजसुद्धा लिहून संपवेनच अशी काही खात्री वाटत नाहीये. बघूयात कसं काय जमतंय - कारण, पहिली ओळ लिहून बरेच दिवस तशीच ठेवलेली - पुढे काहीच नाही दिसतोय म्हणण्याचं कारण, म्हण़जे आजसुद्धा लिहून संपवेनच अशी काही खात्री वाटत नाहीये. बघूयात कसं काय जमतंय - कारण, पहिली ओळ लिहून बरेच दिवस तशीच ठेवलेली - पुढे काहीच नाही कधी कधी लिहायचं मनात असतं, विषयही घोळत असतो डोक्यात, पण हव्या तश्या शब्दांत मांडता येईल की नाही याची खात्री वाटली नाही, की मग लिहिण्यामधली मजा निघून गेल्यासारखी वाटते. मग ठप्प कधी कधी लिहायचं मनात असतं, विषयही घोळत असतो डोक्यात, पण हव्या तश्या शब्दांत मांडता येईल की नाही याची खात्री वाटली नाही, की मग लिहिण्यामधली मजा निघून गेल्यासारखी वाटते. मग ठप्प म्हणजे काही गहन विषय मांडणार नसते - तसलं काही फारसं जमतच नाही म्हणा मला, पण साधं, सोपंही नेमकं मांडायला जमलं पाहिजे की म्हणजे काही गहन विषय मांडणार नसते - तसलं काही फारसं जमतच नाही म्हणा मला, पण साधं, सोपंही नेमकं मांडायला जमलं पाहिजे की अणि अर्थात, आळशीपणाही आहेच. असो. तर, हे दोन अनुभव प्रवासात आलेले. त्रयस्थ दृष्टीतून पाहताना, बरंच काही शिकवून गेलेले. अनुभवही काही जगावेगळे, महान वगैरे नाहीत, पण अजूनही मनात घोळतात. कधीतरी मधेच आठवतात. इथे लिहावेसे वाटले म्हणून...\nमनाजोगतं जमत नाहीये असं वाटतंय, मग लिहायलाही अळंटळं, म्हणून तारखा किती दिवस लागणार दळण संपायला बघूयात, हा विचार त्यामागे किती दिवस लागणार दळण संपायला बघूयात, हा विचार त्यामागे\nतर, पुण्याच्या लोहगाव विमानतळावर थांबले होते. नेहमीसारखंच विमान दिल्लीहून उशीरा सुटलं होत, उशीरा पुण्याच्या हवाई अड्ड्यावर पोचणार होतं आणि तिथून नेहमीसारखं उशीरा सुटणारही होतं. एव्हाना आता याची सवय झालेय, थोडंस अंगवळणीच पडलय म्हणाना, आणि मला यात विमान कंपन्यांचीही शंभर टक्के चूक असेल असं वाटत नाही. अर्थात, उद्या सगळा कारभार सुधारला, तर हवंच आहे म्हणा पण अगदी खूप शिव्या देण्याइतकंही काही नाही हेही खरंच. विमानतळावर एखादी मागची कोपर्‍यातली खुर्ची पकडून, निवांत बसून एकूणच सगळा माहौल निरखण्यात खूप गंम्मत असते. पुन्हा सोबत एखादे आवडणारे पुस्तक असले तर मग कशाला कंटाळा येतोय\nअसो. मूळ मुद्दा सोडून अवांतरच जास्त लिहितेय. :P\nतर, त्याही दिवशी अशीच बसले होते विमानतळावर विमान कधी सुटतंय याची वाट बघत. सुरक्षा तपासण्या वगैरेचे सोपस्कार संपले होते. कधी नाही ते गर्दीही नव्हती. अख्खा विमानतळच मस्त, शांत, निवांत वाटत होता. तितक्यात एक चार पाच वर्षांचं पिल्लू आपल्या आई आणि आज्जीसकट आलं. पिल्लाच्या चेहर्‍यावर प्रचंड उत्साह आणि उत्सुकता एकदम हसरा चेहरा, इकडे तिकडे सगळीकडे भिरभिरणारी नजर. एकदम चैतन्याचा स्रोत एकदम हसरा चेहरा, इकडे तिकडे सगळीकडे भिरभिरणारी नजर. एकदम चैतन्याचा स्रोत पेंगुळल्या, संथ अश्या त्या वातावरणात एकदम काहीशी जान आल्यासारखं झालं, पण आई आणि आज्जी एकदम परीटघडीची इस्त्री छाप पेंगुळल्या, संथ अश्या त्या वातावरणात एकदम काहीशी जान आल्यासारखं झालं, पण आई आणि आज्जी एकदम परीटघडीची इस्त्री छाप चेहर्‍यावर आम्ही विमानातनं प्रवास करतो.. असे काहीसे भाव. माझ्या शेजारची एक खुर्ची सोडून बसले. सामान मधल्या खुर्चीवर. हे सामान वगैरे खुर्च्यांवर ठेवणारे लोक म्हणजे जरा अतिच असतात, असं माझं एकूणच निरिक्षणावरुन बनलेलं मत आहे. कधी कधी तर बसायलाही जागा नसते, आणि यांची सामानं बसायच्या जागांवर चेहर्‍यावर आम्ही विमानातनं प्रवास करतो.. असे काहीसे भाव. माझ्या शेजारची एक खुर्ची सोडून बसले. सामान मधल्या खुर्चीवर. हे सामान वगैरे खुर्च्यांवर ठेवणारे लोक म्हणजे जरा अतिच असतात, असं माझं एकूणच निरिक्षणावरुन बनलेलं मत आहे. कधी कधी तर बसायलाही जागा नसते, आणि यांची सामानं बसायच्या जागांवर रेल्वे फलाटावरही हे नमुने दिसतील रेल्वे फलाटावरही हे नमुने दिसतील तर, मंडळी स्थानापन्न झाली.\nपण, छोटुला भलताच गोडांबा होता एकदम गट्टूकलाल सुरुवातीला अगदी छान्या, छान्या मुलासारखं हाताची घडी, तोंडावर बोट असं तिथल्या एका खुर्चीवर बसून झालं, पण तेह्वाही मान जितक्या अंशात फिरु शकते, तितक्या अंशात फिरवून सगळीकडंच निरिक्षण सुरुच होतं. पाचेक मिनिटांतच शहाणपणाचं ओझं पिल्लाला सांभाळणं जरा जडच व्हायला लागलं. हळूच तिरकी नजर आई आणि आज्जीकडे ठेवत खुर्चीतच चुळबुळायला सुरुवात झाली. हळूच खुर्चीतून खाली उडीपण घेऊन झाली चेहर्‍यावर जरा तरतरीपण आली पिल्लाच्या\nवाटलं होतं तसच झालं काल तर लिहिलंच नाही काही.. तर, श्टोरी पुढे -\nमग हळू हळू पिल्लू इकडे तिकडे बागडायला लागलं, गर्दी नसल्यामुळे बागडायला फुल टू स्कोप होता पण जसजसं पिल्लू खुलायला लागलं, तसतशी परीटघडीच्या इस्त्र्या नाराजीने विसकटायला लागल्या. मी मनात, आता पिल्लू ओरडा खातय वाटतं, म्हणेपर्यंत पिल्लूने ओरडा खाल्लाच पण जसजसं पिल्लू खुलायला लागलं, तसतशी परीटघडीच्या इस्त्र्या नाराजीने विसकटायला लागल्या. मी मनात, आता पिल्लू ओरडा खातय वाटतं, म्हणेपर्यंत पिल्लूने ओरडा खाल्लाच ते एकवेळ ठीक आहे, पण इस्त्र्या एकदम इंग्लिशमधूनच सुरु ते एकवेळ ठीक आहे, पण इस्त्र्या एकदम इंग्लिशमधूनच सुरु आणि ओरडतानापण जी एक आपलेपणाची भावना असते ती काय कुठे दिसतच नव्हती आणि ओरडतानापण जी एक आपलेपणाची भावना असते ती काय कुठे दिसतच नव्हती म्हणजे पिल्लाला काय एकदम मिठीत घेऊन समजवा, असं म्हणत नाही मी, तसं करायलाही हरकत नव्हतीच खरं तर, पण हे भलतच कोरडं प्रकरण होतं, आणि ते जाम खटकलं. बरं, असाही काही भयानक उच्छाद मांडला नव्हता पिल्लानं, पण त्यातही गंम्मत म्हणजे आई, आज्जी इंग्लिशमधून शिस्त शिकवत होत्या, खरं तर त्याच्या माथी मारत होत्या, आणि पिल्लू शुद्ध मराठीमधून न थकता उत्तरं देत (उलट उत्तरं नव्हे म्हणजे पिल्लाला काय एकदम मिठीत घेऊन समजवा, असं म्हणत नाही मी, तसं करायलाही हरकत नव्हतीच खरं तर, पण हे भलतच कोरडं प्रकरण होतं, आणि ते जाम खटकलं. बरं, असाही काही भयानक उच्छाद मांडला नव्हता पिल्लानं, पण त्यातही गंम्मत म्हणजे आई, आज्जी इंग्लिशमधून शिस्त शिकवत होत्या, खरं तर त्याच्या माथी मारत होत्या, आणि पिल्लू शुद्ध मराठीमधून न थकता उत्तरं देत (उलट उत्तरं नव्हे) त्यांच समाधान करत होतं, स्वतःची बाजू पटवून देत होतं. खूप कौतुक वाटलं मला. शेवटी इस्त्र्या थकल्या आणि गप्प बसल्या. पिल्लू परत एकदा खेळाकडे वळलं.\nइतक्यात पिल्लूला एक दुसरं पिल्लू मिळालं खेळायला आपल्या आई बाबांबरोबर एक छोटुली गोबरुली आली होती. त्यांचंही विमान बहुधा उशीराच येणार होतं, आणि ही छोटूली एकदम सही होती, आल्या आल्या गट्टूकलालशी दोस्ती करुन इथे तिथे मस्त बागडंबागडीला सुरुवात. खूप धमाल आली त्यांची बागडंबागडी पहायला. इतके मस्त हसत होते खऴखळून आपल्या आई बाबांबरोबर एक छोटुली गोबरुली आली होती. त्यांचंही विमान बहुधा उशीराच येणार होतं, आणि ही छोटूली एकदम सही होती, आल्या आल्या गट्टूकलालशी दोस्ती करुन इथे तिथे मस्त बागडंबागडीला सुरुवात. खूप धमाल आली त्यांची बागडंबागडी पहायला. इतके मस्त हसत होते खऴखळून धावत होते, पडत होते, परत उठून नाचत होते धावत होते, पडत होते, परत उठून नाचत होते किती मनमोकळं वागत होते किती मनमोकळं वागत होते मला चक्क त्या दोघांचा मनापासून हेवा वाटला. नेहमीचे उगीच अतिशय गंभीरपणे वावरणारे मोठया लोकांचे चेहरे पाहण्यापेक्षा हे खूप छान वाटत होतं. मनातल्या मनात मीही त्यांच्याबरोबर रिंगा रिंगा रोझेस... मधे भाग घेतला.\nपण, मम्मीची कोरडी शिस्त जरा अतिच कोरडी असावी. तिने लगेच पिल्लूला मी आता डॅडला फोन लावून तुझी तक्रार करतेय, असे सांगितले. मला वाटले, असंच सांगतेय घाबरवायला, पण पिल्लूचा लगेच उतरलेला चेहरा, कावरीबावरी नजर आणि अगदी काकुळतीला येऊन केलेल्या \"नक्को ना गं मम्मी.. \" अश्या विनंत्या बघून हे खरंच आहे समजेपर्यंत मम्मी डॅडशी फोनवर बोलून अगदी गंभीर स्वरात - अर्थात इंग्लिशमधेच - तक्रार करत होती आणि डॅडने पिल्लूला फोनवर बोलावलं. खरं सांगायचं तर मलापण मम्मीचा एकदम राग आला होता बरं, आज्जीने तरी नातवाची जरा बाजू घ्यायची ना बरं, आज्जीने तरी नातवाची जरा बाजू घ्यायची ना तेपण नाही तीपण इंग्लिश ओरडा देण्यात मग्न असली कसली आज्जी आता पलिकडून डॅड काय ओरडणार, याची धाकधूक मलाच वाटायला लागली...\n\"हॅलो डॅडू...\" चाचरतच पिल्लू बोललं, आणि बघता बघता पिल्लाचा घाबरा, कोमेजला चेहरा परत फुलायला लागला की डॅडूला पिल्लू सगळ्या गंमती जमती सांगत होतं, अश्शी उडी मारली न् तश्शी उडी मारली न् धावलो मी मस्त... डॅडूला पिल्लू सगळ्या गंमती जमती सांगत होतं, अश्शी उडी मारली न् तश्शी उडी मारली न् धावलो मी मस्त... नवीन मैत्रीण मिळालीय, आणि ती आणि मी कशा उड्या मारुन ढुमाक्कन् (पिल्लूचाच शब्द नवीन मैत्रीण मिळालीय, आणि ती आणि मी कशा उड्या मारुन ढुमाक्कन् (पिल्लूचाच शब्द ) खालीच बसतोय, मज्जाच येतेय, आपणपण करुयात असं मी आलो की, हेही सांगून झालं ) खालीच बसतोय, मज्जाच येतेय, आपणपण करुयात असं मी आलो की, हेही सांगून झालं माझ्या समोरच काही पावलांवर उभं राहून या गप्पा सुरु होत्या. माझी हळूच आईकडे - नव्हे, मम्मीकडे नजर वळली, तीच परीटघडी बघून किंचित खट्टूच व्हायला झालं. आज्जीच्या डोळ्यांत पण फारसं कौतुक दिसत नव्हतं... ये बात तो बिलकुल हजम नै हुई\nपण, डॅडू आणि पिल्लूचं एकदम गुळपीठ दिसत होतं आणि सगळ्या गप्पा मराठीतूनच चालल्या होत्या. अगदी दिलखुलासपैकी. मस्त वाटलं, अगदी याsssहू करून ओरडावसं वाटलं कोणीतरी पिल्लाशी त्याच्या भाषेत बोलणारं आणि त्याच्या बरोबर ढुमाक्कन् खाली बसणारं पण आहे तर कोणीतरी पिल्लाशी त्याच्या भाषेत बोलणारं आणि त्याच्या बरोबर ढुमाक्कन् खाली बसणारं पण आहे तर डॅडूशी गप्पा संपवून गट्टूकलाल परत एकदा खेळात गुंगले. त्याबद्दल अजून दोन तीनदा अस्सखल इंग्लिशमधून ओरडापण खाल्ला. एवढं त्या छोट्याला डांबायची काय गरज त्यांना वाटत होती, मला काहीच कळू शकलं नाही. ज्या छोटूलीबरोबर तो सुखाने खेळत होता, तिच्याशीदेखील त्यांच वागणं बरोबर नव्हतं, ते तर जामच खटकलं, तेवढयात तिच्या आई वडिलांचं लक्ष गेलं आणि त्यांनी तिला बोलावून घेतलं. काही काही लोकांना दिलखुलास वागण्या बोलण्याचं वावडं असतं का डॅडूशी गप्पा संपवून गट्टूकलाल परत एकदा खेळात गुंगले. त्याबद्दल अजून दोन तीनदा अस्सखल इंग्लिशमधून ओरडापण खाल्ला. एवढं त्या छोट्याला डांबायची काय गरज त्यांना वाटत होती, मला काहीच कळू शकलं नाही. ज्या छोटूलीबरोबर तो सुखाने खेळत होता, तिच्याशीदेखील त्यांच वागणं बरोबर नव्हतं, ते तर जामच खटकलं, तेवढयात तिच्या आई वडिलांचं लक्ष गेलं आणि त्यांनी तिला बोलावून घेतलं. काही काही लोकांना दिलखुलास वागण्या बोलण्याचं वावडं असतं का इतक्या लहान मुलाच्या मनात मोठेपणाच्या इतक्या तद्दन फालतू अन् खोट्या कल्पना का भरवायच्या इतक्या लहान मुलाच्या मनात मोठेपणाच्या इतक्या तद्दन फालतू अन् खोट्या कल्पना का भरवायच्या (त्यांचं आपल्या छोटूशी काय बोलणं सुरु होतं, आणि त्याला जे \"समजावणं\" सुरु होतं, ते मी ऐकू शकले होते, त्यावरुन हे विधान करतेय. )\nतेवढ्यात माझी विमानात चढायची वेळ झाली. मनातल्या मनात छोटूला बेस्ट लक दिलं, मनात आलं, ह्याची हसरी वृत्ती कधीच नाहीशी होऊ नये... मला त्याच्याशी हातही मिळवायचा होता, पण मनातली उर्मी मनातच ठेवली, न जाणो त्याच्या मम्मी, आज्जीला आवडलं नाही तर, म्हणून.... छोटू कसा असेल, असं मनात येतंच कधी कधी अजूनही.\nआणि बरोब्बर याउलट दुसरा अनुभव. बंगलोरच्या विमानतळावर बसले होते. अर्धा पाऊण तास वेळ काढायचा होता. एक आई आपल्या लेकीला घेऊन आली. तीन चार वर्षांची भावली एकदम चुणचुणीत होती माझ्या समोरच्या खुर्च्यांवर दोघी बसल्या. भावलीही इकडे तिकडे धावत होती. आईचं बरोबर लक्ष होतं, पण भावलीला मनसोक्त बागडायलाही आडकाठी केलेली दिसली नाही. उलट, आईही मुलीबरोबर हसत होती, बसल्या जागेवरुनच लेकीशी संवाद साधत होती, बघायलाही इतकं लोभसवाणं वाटत होतं माझ्या समोरच्या खुर्च्यांवर दोघी बसल्या. भावलीही इकडे तिकडे धावत होती. आईचं बरोबर लक्ष होतं, पण भावलीला मनसोक्त बागडायलाही आडकाठी केलेली दिसली नाही. उलट, आईही मुलीबरोबर हसत होती, बसल्या जागेवरुनच लेकीशी संवाद साधत होती, बघायलाही इतकं लोभसवाणं वाटत होतं खेळून खेळून भावली दमली आणि आईच्या कुशीत शिरुन, तिच्या खांद्यावर मान ठेवून दोन मिनिटांत मस्तपैकी झोपून गेली. ज्याप्रकारे त्या आईने तिला कुशीत धरली होती, तिच्या केसांवरुन इतक्या मायेने हात फिरवत होती... तिची ती लेकीबद्दलची माया, आत्मियता अगदी माझ्यापर्यंत पोचली खेळून खेळून भावली दमली आणि आईच्या कुशीत शिरुन, तिच्या खांद्यावर मान ठेवून दोन मिनिटांत मस्तपैकी झोपून गेली. ज्याप्रकारे त्या आईने तिला कुशीत धरली होती, तिच्या केसांवरुन इतक्या मायेने हात फिरवत होती... तिची ती लेकीबद्दलची माया, आत्मियता अगदी माझ्यापर्यंत पोचली एकदम एक उबदार भावना मनात उभी राहिली. ते दृश्य मनात साठवत, खूप समाधानानं मी विमानात चढायच्या रांगेत उभी राहिले. माझ्या त्या दिवसाची सुरुवात ह्या मायलेकींमुळे अगदी मस्त झाली होती\nअनुभव अगदी साधेच आहेत, त्यातून उपदेशपरही मला काही सांगायचं वगैरे नाही किंवा आपापल्या मुलांशी कोणी कसं वागावं ह्यासंबंधीही टीकाटिप्पणी करायची नाही एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून मी ते अनुभव जसे घेतले, तेह्वा माझ्या मनात आलेल्या विचारांसकट, ते तुम्हां सर्वांना सांगावेसे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच, बाकी काही नाही एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून मी ते अनुभव जसे घेतले, तेह्वा माझ्या मनात आलेल्या विचारांसकट, ते तुम्हां सर्वांना सांगावेसे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच, बाकी काही नाही बरेच दिवसांपासून हे लिहायचं राहून गेलं होतं, खरं तर, लिहू की नको, असं लिहिणं बरोबर आहे की नाही, ह्याची स्वतःच्या मनाशी खात्री होत नव्हती. आज संपलं लिहून.\nसुंदर झालाय लेख. ती मुलं अक्षरश: डोळ्यापुढे उभी राहतात.गुड वन.\nधन्यवाद अभिजित आणि अपर्णा.\nकोहम, खरय.. पण असंही वाटलं की मी कोण ठरवणार त्यांच वागणं चूक की बरोबर मी बाहेरुन एक त्रयस्थ दृष्टीने पाहताना मला १००% काहीच माहित नसताना, अस लिहिणं म्हणजे जरा आगाऊपणा केल्यासारखं असं काहीतरी वाटलं..\nआपले निरीक्षण व ते लिहीण्याचे कौश्यल्य जबरदस्त आहे.\nया वयात मुलांनी मस्ती नाही करयची तर केव्हा करायची \nया वरुन एक प्रसंग आठव्ला. आम्ही कार्यालयाच्या पिकनीकला किहीम बीच वर गेलो होतो, माझ्या तीन-चार वर्षाच्या मुलाने दुसऱ्या तेवढ्याच मुलावरोबर खेळायला, मस्ती करयला सुरवात केली, लगेचच त्याच्या वडीलांनी माझाकडे येवुन तक्रार कर्रयला सुरवत केली, त्यांच्या अतीनाजुक मुलाला लागेलबिगेल याची.\nछानच लिहिलं आहेस. वाचतांना ती मुलं डोळ्यासमोर आली . पण तुझा कविता पानोपानी ब्लॉग नाही उघडता आला\nमाझिया मना जरा सांग ना\nप्रतिबिंब - आणि हा ब्लॉग बघणीय पण :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/209/Niajroop-Dakhawa-Ho.php", "date_download": "2018-08-18T08:37:16Z", "digest": "sha1:DC6M4D4PIZLSM4X5F5ULRIN4ZDJRCTBK", "length": 12114, "nlines": 151, "source_domain": "www.gadima.com", "title": "Niajroop Dakhawa Ho -: निजरूप दाखवा हो : BhaktiGeete (Ga.Di.Madgulkar|Sudhir Phadke|Sudhir Phadke) | Marathi Song", "raw_content": "\nआई सारखे दैवत सार्‍या जगतावर नाही\nम्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ,आ,ई\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nचित्रपट: झाला महार पंढरीनाथ Film: Zala Mahar Pandharinath\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nनिजरूप दाखवा हो,हरि दर्शनास द्या हो\nअवरुद्ध साद माझा प्रतिसाद त्यास द्या हो\nआला गजेंद्र मोक्षा तैसे पुनश्च या हो\nजळत्या निळ्या वीजेची प्रभू एक झेप घ्या हो\nनरसिंह होवुनीया घुमवीत गर्जनासी\nशतसूर्य तेज दावा अज्ञात या जनासी\nभ्याला समुद्र क्रोधा ते रामचंद्र व्हा हो\nपार्थास दाविले ते प्रभू विश्वरूप दावा\nमुरली मनोहरा या व्हा वाजवीत पावा\nएका करांगुलीने गोवर्धना धरा हो\nराज:भ्रमा पटू द्या प्रत्यक्ष एकवार\nश्रीकृष्ण-विष्णू-राम तोचि विठू महार\nजाळी तनामनासी ती आग शांतवा हो\nमहाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.\nपतित पावन नाम ऐकुनी\nपाहुणी आली माझ्या घरी अंबिका\nतुझे रूप चित्ती राहो\nउघडले एक चंदनी दार\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=151&Itemid=344&limitstart=2", "date_download": "2018-08-18T08:15:01Z", "digest": "sha1:LXUCJS4QIJVPI3ZW4WNN5ESMPDVPOTJT", "length": 4773, "nlines": 35, "source_domain": "saneguruji.net", "title": "यज्ञ", "raw_content": "शनिवार, आँगस्ट 18, 2018\n“अरे, माझ्यासमोर जरा सौम्य रूर धर. तुझे जीवनकार्य करताना तुला पाहिजे असेल ते रूप घे.” प्रभू म्हणाला.\n“वत्सा, तुझे काम या सर्व प्राणीमात्रांची परीक्षा घेण्याचे. या जगाला मी जी शिकवण दिली आहे, तिची त्यांना स्मृती आहे की नाही, हे पाहा. लोक यज्ञनिष्ठ आहेत की नाहीत ते पाहा. एकाही व्यक्तीच्या ठिकाणी हे यज्ञतत्त्व उत्कृष्टपणे बिंबले असले तरी पुरे ती एक व्यक्तीही विश्वाला तारील. जा ती एक व्यक्तीही विश्वाला तारील. जा \n“तात, मी परीक्षा कशी घेऊ मी माझे काम कसे करू मी माझे काम कसे करू कोणती माझी साधने आधी माझे नाव काय, ते मला सांगा. त्या नावावरून माझ्या कर्माचा मला नीट बोध होईल. नावावरून कर्म सुचते, जीवनाची दिशा समजते. सांगा, मला कोणत्या नावाने संबोधणार \n“तुझे नाव वृत्र. समजलास ना त्या नावात सारे आहे. जा आता. आपल्या कार्याला लाग. तुझ्या हृदयात तुझ्या कर्माची प्रेरणा मी ठेविली आहे. ती अंतःप्रेरणा ओळख. मी आता आणखी काही सांगणार नाही. मी थोडी सूचना देत असतो. तीवरून सारे समजून घ्यावे.”\nवृत्राला निरोप देऊन प्रभू पुन्हा मायेचा पीतांबर घेऊन चिन्मयाच्या पलंगावर पहुडला. वृत्र विचार करीत निघून गेला. तो एका डोंगराच्या शिखरावर बसला. तेथून तो सारे पाहात होता. पाहून विचार करीत होता. प्रभूने माझे नाव वृत्र ठेविले आहे. वृत्र म्हणजे आच्छादणारा, पांघरूण घालणारा. मी कोणाला आच्छादू. कोणाला पाघरूण घालू कोणाला पोटात घेऊ जगाची परीक्षा घ्यायची, कशी घेऊ माझा स्वधर्म कसा पार पाडू माझा स्वधर्म कसा पार पाडू जगाची कसोटी कशी घेऊ \nवृत्र विचार करीत करीत वर वर चालला. विश्वाला तो प्रदक्षिणा घालू लागला. सर्व चराचरीचे तो निरिक्षण करू लागला. या चराचरांची मुख्य नाडी कशात आहे, ते शोधू लागला. आजूबाजूच्या सृष्टीचे स्वरूप नीट समजून घेतल्याशिवाय आपले जीवितकार्य आपणांस नीट पार पाडता येत नसते, यासाठी वृत्र सारे न्याहाळीत होता.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/cancer-womens-dangerous-130519", "date_download": "2018-08-18T08:56:14Z", "digest": "sha1:EDUO3UEJNEQJP3YUWCQAVDNGNJWJLKY4", "length": 15366, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "cancer in womens dangerous महिलांनो कर्करोग समजुन घ्या! | eSakal", "raw_content": "\nमहिलांनो कर्करोग समजुन घ्या\nशनिवार, 14 जुलै 2018\nमहिलांच्या शरिरातील सर्वप्रकारच्या आढळणाऱ्या गाठी कॅन्सरच्या नसतात. मात्र त्या गाठींकडे दुर्लक्ष करुन चालणार नसल्याचे सांगत. या गाठींची मेमोग्रॅफी करुन घेण्याचा सल्लाही त्यांनी महिलांना दिला. स्तनाचा कर्करोगाला शहरातील व्यस्त व बैठे जीवनपद्धती वपॅकेज, जंक व फास्ट फुडच्या आहार जबाबदार असल्याचे त्या म्हणाल्या. शाररीक श्रम, हिरव्या पालेभाज्या, ताजे अन्नपदार्थ, फळांचे सेवन आहारात गरजेचे असुन स्वच्छतेवर लक्ष देण्याचा सल्ला डॉ. माहेश्‍वरी यांनी दिला.\nऔरंगाबाद : निरोगी आणि सुखी जीवनातही स्वतःची काळजी घेतली पाहीजे. समतोल पोषक आहार आणि योग्य व्यायाममुळे निरोगी आयुष्य जगणे शक्‍य आहे. नैसर्गिक कारणांनी होणारा कर्करोग थांबवणे आपल्या हातात नसले तरी कर्करोग होऊ नये म्हणुन काळजी घेणे गरजेची आहे. त्यासाठी कर्करोग महिलांनी समजुन घेतला पाहीजे. लवकर निदान व वेळीच उपचार घेतल्यास कर्करोगापासुन मुक्ती शक्‍य असल्याचे मत टाटा कर्करोग रुग्णालयाच्या कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. अमिता माहेश्‍वरी यांनी मांडले.\nफाईट अगेंस्ट कॅन्सर या उपक्रमाअंतर्गत मायनॉरीटी फ्रंट आणि टाटा कर्करोग रुग्णालयाच्या वतीने एमजीएमच्या द्योतन सभागृहात शुक्रवारी (ता. 13) पार पडलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. राजेंद्र बोरा, डॉ. प्रविण सुर्यवंशी, डॉ. राजेंद्र प्रसाद जैस्वाल, एस ए जाफरी, गौरी रावेरकर, डॉ. अरविंद गायकवाड यांच्यासह महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. डॉ जावेद खान यांनी कार्यक्रमाचे प्रास्थाविक केले.\nदेशातील दुसरा सर्वात मोठा कर्करोगावर उपाय शक्‍य झाले. ग्रामीण भागात एक चतुर्थअंश स्त्रीयांना हा कर्करोग आढळत असुन तर दर आठ मिनिटाला एक महिलेचा मृत्यू होतो. कमी वयात शाररिक संबंध,जास्तवेळ गर्भधारना, तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन, पोषक आहाराची कमतरतेमुळे व ह्युमन पॅप्लीओमा व्हायरसच्या (एचपीव्ही) इन्फेक्‍शनमुळे हा कर्करोग जडतो. यासाठी एचपीव्ही व्हॅक्‍सीन 9 ते 13 वयाच्या दरम्यान लहान मुलींसाठी उपलब्ध आहे. ती 26 वर्षापर्यंत घेता येते. मात्र ती सत्तर टक्केच प्रभावी असल्याचे सिद्ध झाले असल्याचे डॉ. माहेश्‍वरी म्हणाल्या.\nगर्भपिशवी व अंडकोशाचा कर्करोग\nगर्भपिशवि तसेच अंडकोशाच्या कर्करोगावरील उपचार व शस्त्रक्रीयेची माहीती देतांना त्यांना किमो थेरपीला घाबरुन चालणार नसल्याचे सांगितले. तसचे वयाच्या पंचविशीनंतर दर तीन वर्षांना पॅपस्मेअरची चाचणी गरजेची आहे.\nमहिलांच्या शरिरातील सर्वप्रकारच्या आढळणाऱ्या गाठी कॅन्सरच्या नसतात. मात्र त्या गाठींकडे दुर्लक्ष करुन चालणार नसल्याचे सांगत. या गाठींची मेमोग्रॅफी करुन घेण्याचा सल्लाही त्यांनी महिलांना दिला. स्तनाचा कर्करोगाला शहरातील व्यस्त व बैठे जीवनपद्धती वपॅकेज, जंक व फास्ट फुडच्या आहार जबाबदार असल्याचे त्या म्हणाल्या. शाररीक श्रम, हिरव्या पालेभाज्या, ताजे अन्नपदार्थ, फळांचे सेवन आहारात गरजेचे असुन स्वच्छतेवर लक्ष देण्याचा सल्ला डॉ. माहेश्‍वरी यांनी दिला.\nबारामती - विद्या प्रतिष्ठानच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पुरस्कार\nबारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट...\nपंकज भूसे यांचा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव\nसरळगांव - महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी होऊन दिलेल्या उद्दिष्टा पेक्षा जास्त वृक्ष लागवड करून उत्कृष्ट कामगिरी केल्याने...\nचिंचवडमध्ये रविवारी रंगणार महिला प्रेरणा संमेलन\nवाल्हेकरवाडी - स्वयंसिद्धा प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड शहर) आणि प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि. 19 ऑगस्ट) चिंचवड...\nघरकामगार, बांधकाम मजूर महिलांची उपेक्षाच\nजळगाव : दिवसरात्र काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, पण डोक्‍यावर हक्काचं छत नाही...सतत कष्ट करूनही पदरी काहीच न पडल्यामुळे अनेकदा उपवास...\nसमस्या सोडवण्यासाठी नाशिकला भरणार शिक्षकांचा दरबार\nयेवला - शिक्षकांच्या विविध रखडलेल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी नाशिकमध्ये विभागातील शिक्षकांचा शिक्षक दरबार गुरुवारी (ता.२३) आयोजित करण्यात आला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/celebrities/smita-gondkar", "date_download": "2018-08-18T08:17:55Z", "digest": "sha1:YGKF7NL3IWP5T5J5TNZ3J2R4GJMRFWAL", "length": 4170, "nlines": 48, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Smita Gondkar | Marathi Dhamaal", "raw_content": "\nस्मिता गोंडकर हिने विविध राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत कर्णधार म्हणून ‘महाराष्ट्र राज्य कायाकिंग’ संघाचं प्रतिनिधीत्व केलं होतं. तिने गोवा येथील ‘नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ वॉटर स्पोर्ट्स’मधील सदस्यांना भेट दिली, जिथे तिने ‘व्हाईट वॉटर कायाकिंग’ मोहिमेसाठी प्रशिक्षण घेतलं होतं. कॉलेजमध्ये असताना स्मिता राज्यस्तरीय पातळीवर ‘स्कलकिंग आणि रोईंग’ जिंकली आणि शाळेत असताना राज्यस्तरीय पातळीवर पोहणे आणि नॅशनल ज्युडोमध्ये सहभागी झाली होती. तसेच स्मिताला डर्ट ट्रॅक रेसिंग आणि स्काय डायविंगची आवड आहे. लहानपणापासून स्मिताला अभिनयाची आवड होती. शाळेत असताना विविध नाटक आणि रॅम्प शोमध्ये तिने सहभाग घेतला. फूड अँड बेवरेज डिपार्टमेंट स्टाफचे पण प्रशिक्षण तिने घेतले. नंतर तिला मॉडलिंगसाठी ऑफर आली आणि त्यानंतर काही चित्रपट मिळाल्यामुळे तिने तिच्या अभिनयाच्या आवडीकडे लक्ष दिलं.\nजन्म ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र, भारत\nवॉण्टेड बायको नंबर वन\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\n लाफ्टर क्वीन प्राजक्ता हनमघरचे झाले शुभमंगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=151&Itemid=344&limitstart=4", "date_download": "2018-08-18T08:14:55Z", "digest": "sha1:N4Y5JOB6CTWR7KVLW22IB7RZHA2QFVKK", "length": 7876, "nlines": 32, "source_domain": "saneguruji.net", "title": "यज्ञ", "raw_content": "शनिवार, आँगस्ट 18, 2018\nसूर्याजवळ धगधगीत प्रकाश दिसे. अल्पही मालिन्य त्याच्याजवळ दिसत नसे. आपल्या बुद्धीतही किल्मिष नसावे, मालिन्य नसावे, असे मननशील मानवाला वाटे. तो सूर्याला म्हणे, “हे सूर्य तुझ्या तेजोमय प्रकाशधारा पिऊन आमची बुद्धी निर्मळ होवो. आमची बुद्धी स्वतंत्र असो, जागृत असो. मालिन्याचा लवलेशही आमच्या बुद्धीजवळ नसो.” अशी प्रार्थना करून कृतज्ञतेने मनवप्राणी सूर्याला अर्ध्य देत. त्याला सुंदर फुले देत. कोणी त्याचा जप करीत, कोणी त्याचे सतत स्तवन करीत.\nवृत्र या गोष्टी पाहत होता. चराचराचे जीवन मुख्यत्वेकरून हा सूर्य व याच्या तेजःप्रसवा गाई यांच्यावर अवलंबून आहे, ही गोष्ट प्रखर प्रज्ञेच्या वृत्राच्या ध्यानात आली. चराचराच्या जीवनाचा सूर्य हा प्राण आहे, आधार आहे. या सूर्याला त्याच्या गाईंसह आपण गिळून टाकिले तर असा एक विचार वृत्राच्या मनात आला. सूर्य व त्याच्या गाई नसतील तर सारे विश्वयंत्र बंद पडेल. सर्वत्र अंधार पसरेल. उष्णता नाहीशी होईल. वारे वाहणार नाहीत, मेघ बनणार नाहीत, पाऊस पडणार नाही, वृक्षवनस्पती वाढणार नाहीत, मानव जगणार नाहीत. सर्वत्र प्रेतकळा ओढवेल. या विश्वाचे मग कोण रक्षण करील असा एक विचार वृत्राच्या मनात आला. सूर्य व त्याच्या गाई नसतील तर सारे विश्वयंत्र बंद पडेल. सर्वत्र अंधार पसरेल. उष्णता नाहीशी होईल. वारे वाहणार नाहीत, मेघ बनणार नाहीत, पाऊस पडणार नाही, वृक्षवनस्पती वाढणार नाहीत, मानव जगणार नाहीत. सर्वत्र प्रेतकळा ओढवेल. या विश्वाचे मग कोण रक्षण करील कोणता देव वा मानव उभा राहील कोणता देव वा मानव उभा राहील प्रभू म्हणाला की, यज्ञधर्म जिवंत असेल तरच त्याचे रक्षण होईल. पाहू या. हीच परीक्षा होईल, गंमत होईल.\nवृत्र हसला. भेसूर हसणे, मरणरूप हसणे. ते हसणे म्हणजे चराचराचे मरण होते. गिळू का गाईंसह हा सूर्य त्याने स्वतःला प्रश्न विचारला. या सूर्याला गाईंसह गिळण्याची आहे का आपली शक्ती, या गोष्टींचा तो विचार करू लागला. पुन्हा तो हसला व म्हणाला, ‘वेडाच आहे मी. माझ्या स्वरूपाचाच मला विसर पडला. मी वाटेल तेवढा मोठा होऊ शकतो. या ब्रह्माण्डाचा मी एक घास करू शकेन. वाढवू का माझे रूप त्याने स्वतःला प्रश्न विचारला. या सूर्याला गाईंसह गिळण्याची आहे का आपली शक्ती, या गोष्टींचा तो विचार करू लागला. पुन्हा तो हसला व म्हणाला, ‘वेडाच आहे मी. माझ्या स्वरूपाचाच मला विसर पडला. मी वाटेल तेवढा मोठा होऊ शकतो. या ब्रह्माण्डाचा मी एक घास करू शकेन. वाढवू का माझे रूप होऊ का विराट वेषधारी होऊ का विराट वेषधारी परंतु माझा नाश तर नाही ना कोणी करणार परंतु माझा नाश तर नाही ना कोणी करणार कोण करणार माझा नाश कोण करणार माझा नाश महान यज्ञाशिवाय कोणतेही शस्त्र माझ्यावर चालणार नाही. यज्ञधर्म तर मेल्यासारखाच झाला आहे. हे स्वर्गात राहणारे देव तर नाचरंगात दंग झाले आहेत. अमृताचा पेला व अप्सरांच्या ओठांचा पेला हे दोन पेले त्यांना सदैव लागतात. यज्ञाचे त्यांना भानही नाही. परंतु मानवात यज्ञधर्म अद्याप रूढ आहे. मानवांनी यज्ञधर्म परमोच्च मानला आहे. यज्ञोपासना ते वाढवित आहेत, परंतु जाऊन पाहिले पाहिजे. या बाह्य यज्ञोपासनेच्या आत डोकावून पाहिले पाहिजे.’\nवृत्राने लघुरूप धारण केले व तो भूतलावर हिंडूफिरू लागला. त्याने नाना देश पाहिले. द्वीपद्वीपांतरे पाहिली, परंतु निर्मळ व सोज्वळ यज्ञोपासना त्याला कोठेही दिसली नाही. हिंडता हिंडता तो खाली भारतभूमीत आला. हिमालयाची सू्र्याला भेटू पाहणारी ती स्वच्छ शिखरे पाहून तो आनंदला. हिमालयाच्या पोटातून वाहणा-या सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा वगैरे पवित्र नद्या त्याने पाहिल्या. त्याने खालचा विंध्याद्रीचा हिरवागार कमरपट्टा पाहिला. पूर्वेस व पश्चिमेस उचंबळणारा सहस्त्रावधी लाटांचा सागर त्याने पाहिला. भारताचे भौगोलिक सौंदर्य पाहून वृत्र वेडा झाला. निरभ्र आकाश, प्रसन्न नद्या, उत्तुंग पर्वत, पाताळाला भेटू पाहणा-या खोल द-या, नाना रंगांची व गंधांची फुले, नाना स्वादांची मधुर फळे, नाना प्रकारचे धीरगंभीर वृक्ष, नाचणा-या वेळली, सुंदर मोहक रंगांचे पक्षी व त्यांचे कर्णमधुर आलाप- सारे वातावरण हृदयहारी होते. वृत्राने भारताला प्रणाम केला.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/madarsas-encourage-peace-cant-comment-about-those-jk-37954", "date_download": "2018-08-18T08:42:30Z", "digest": "sha1:UQHLFUTL2A2SQN2P47GF4UZ3S2SZYP2C", "length": 12508, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "'Madarsas encourage peace, can't comment about those in JK' 'जम्मू-काश्‍मिरशिवाय देशातील सर्व मदरश्‍यांमध्ये दिले जातात शांततेचे धडे' | eSakal", "raw_content": "\n'जम्मू-काश्‍मिरशिवाय देशातील सर्व मदरश्‍यांमध्ये दिले जातात शांततेचे धडे'\nशनिवार, 1 एप्रिल 2017\nदेशभरातील सर्व मदरश्‍यांमध्ये शांततेचे धडे दिले जातात, असा दावा मध्य प्रदेश मदरसा बोर्डाचे अध्यक्ष सय्यद इमामुद्दीन यांनी म्हटले आहे. मात्र, जम्मू-काश्‍मिरमध्ये काय चालते, त्याबाबत माहिती नसल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.\nभोपाळ (मध्य प्रदेश) : देशभरातील सर्व मदरश्‍यांमध्ये शांततेचे धडे दिले जातात, असा दावा मध्य प्रदेश मदरसा बोर्डाचे अध्यक्ष सय्यद इमामुद्दीन यांनी म्हटले आहे. मात्र, जम्मू-काश्‍मिरमध्ये काय चालते, त्याबाबत माहिती नसल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.\nवृत्तसंस्थेशी बोलताना इमामुद्दीन म्हणाले, \"मी संपूर्ण जबाबदारीने सांगतो की जम्मू-काश्‍मिरसोडून देशभरातील सर्व मदरश्‍यांमध्ये शांततेचे धडे दिले जातात. तेथे काय होते याबाबत काहीही माहिती नाही.' मदरश्‍यामध्ये शिकविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये एक नवा पाठ समाविष्ट करण्यात येणार असल्याचे यावेळी इमामुद्दीन यांनी सांगितले. ते म्हणाले, \"आम्ही \"वतन से मोहब्बत का इस्लाम मे क्‍या महत्त्व है' या मुद्यावर आधारित एक नवा पाठ अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे. प्रत्येकाने आपल्या देशावर, मातीवर प्रेम करायला हवे.' आपल्या देशावर प्रेम करणे ही प्रत्येकाची केवळ सामाजिक जबाबदारी नसून ते धार्मिक कर्तव्य असल्याचेही ते पुढे म्हणाले. वर्तमान स्थितीत नैतिक मूल्यांचा समावेश असलेल्या पाठाचा प्रत्येक शैक्षणिक संस्थेने अभ्यासक्रमात समावेश करावा, अशी सूचनाही इमामुद्दीन यांनी दिली.\nमध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे आमचे प्रेरणास्थान असल्याचे म्हणत इमामुद्दीन यांनी सांगितले की, \"आमचे मुख्यमंत्री आम्हा साऱ्यांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी राज्यात मोठा विकास केला आहे. धर्म आणि जातीच्या पलिकडे जाऊन ते सर्वांसाठी काम करत आहेत.'\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nपिंपळवंडीला मानव-बिबट सहजीवन जनजागृती\nजुन्नर - पिंपळवंडी ता.जुन्नर येथे मानव व बिबट संघर्ष व सहजीवन याविषयी मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती करण्यात आली. जुन्नर वन विभाग तसेच...\nरावेतला स्वतंत्र पोलिस चौकीची मागणी\nवाल्हेकरवाडी - रावेत परिसराचा विकास झपाट्याने वाढत आहे, त्याचप्रमाणे गुन्हेगारीही वाढत आहे. रावेत परिसरात गुन्हा घडला अथवा काही कारणास्तव पोलिस...\nपंतप्रधानांकडून केरळसाठी 500 कोटींची मदत जाहीर\nतिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल...\nनोटा बदलवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश\nरावेर : जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा बदलून देणाऱ्या गुजरातमधील टोळीस इंदूरमध्ये मध्य प्रदेश पोलिसांनी आज पकडले. या टोळीत रावेर, भुसावळच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/pagination/35/0/0/0/1/geetgopal-sham-joshi", "date_download": "2018-08-18T08:34:33Z", "digest": "sha1:UMWZMICV64AKIFDHDJNC3SMV6V5755SN", "length": 10442, "nlines": 127, "source_domain": "www.gadima.com", "title": "GeetGopal (Sham Joshi) : गीतगोपाल (श्याम जोशी) : Ga Di Madgulkar (GaDiMa)", "raw_content": "\nज्ञानियाचा वा तुक्याचा,तोच माझा वंश आहे\nमाझिया रक्तात थोडा,ईश्वराचा अंश आहे\nगीतगोपाल (संगीत:श्याम जोशी) | Geetgopal (Sham Joshi)\nगीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हंटला,तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसताना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकवाला जातांना गळ्यात रुठवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल.\nसंगीतकार श्याम जोशी यांनी संगीतबद्ध केलेले गीतगोपाल\nगायक: उषा मंगेशकर,सुरेश वाडकर\nया विभागात उपलब्ध गाणी : 8 (पान 1)\n१) शरच्श्रंद्रिका मूक हुंकार देते | Sharad Chandrika Muk Hunkaar Dete\n५) पिता पुत्र काजळरात्री | Pita Putra KaajalRaatri\nमहाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/celebrities/sneha-chavan", "date_download": "2018-08-18T08:17:25Z", "digest": "sha1:NT2Y6VO64F5AXGCLIPAPRWXB36VGDBLF", "length": 2005, "nlines": 45, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Sneha Chavan | Marathi Dhamaal", "raw_content": "\nउंची: 5 फूट 7 इंच (5'7\")\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation शाहीद कपूरचा भाऊ साकारणार का ‘परश्या’ची भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2018-08-18T09:08:20Z", "digest": "sha1:3UT5KQE5YSYGSH7PSY6EDFRIL5UIZ3OR", "length": 4399, "nlines": 61, "source_domain": "m4marathi.com", "title": "परंपरा भेटवस्तूची | m4marathi", "raw_content": "\nदिवाळीनिमित्त एकमेकांना भेटवस्तू देण्याची परंपरा आपल्याकडे संस्कृती म्हणून जपली जाते. भेटवस्तू छोटी का मोठी याचे मोल नसते, ती ज्याला द्यावयाची असते, त्या व्यक्तीचे, नात्याचे मोल अमूल्य असते. म्हणूनच भेट म्हणून निवडावयाची वस्तू चोखंदळच निवडावी.\nदिवाळीनिमित्तच्या भेटवस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. ग्लास, वूडन, मोती, मेटल यापासून बनविलेल्या भेटवस्तूंबरोबर सोन्या, चांदीच्या किंमती दागिन्यांची भेट देऊनही आपल्या माणसांना खूश केले जाते. याकरिता सराफ बाजारात अनेक कंपन्यांनी खास भेट देण्याकरिता म्हणून अनेक छोट्या पण मौल्यवान वस्तूंची निर्मिती केली आहे. गिफ्ट शॉपीमध्ये चक्कर मारली असता लक्षात येईल की, आपापल्या आवडीनुसार असंख्य व्हरायटी बजेटमध्ये उपलब्ध आहेत.\nभेटवस्तू देण्यात परफ्यूमची पसंती आाघडीवर आहे. याशिवाय दिवाणखान्यातल्या शो केसमध्ये दिमाखात झळकतील, अशा अनेक वस्तूंची बाजारात रेलचेल आहे. गिफ्ट देताना कोणाला देणार आहोत, नाते, वय, देणार्‍याचा स्वभाव, आवड याची नोंद घेत अशी भेट द्या की, जी दिल्याने देणारा आणि घेणारा सुखावून जाईल.\nमतदान करावं तरी कुणाला \nद्रष्टे समाजसुधारक ….राजर्षी शाहू महाराज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/mi-pahilela-bapu-book-publishing/", "date_download": "2018-08-18T08:45:41Z", "digest": "sha1:7FGV3LT4PYUK2MBKL7LSHBOASBP5SUXF", "length": 7853, "nlines": 74, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "मी पाहिलेला बापू - पुस्तक प्रकाशन » Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nमी पाहिलेला बापू – पुस्तक प्रकाशन\nमी पाहिलेला बापू – पुस्तक प्रकाशन\nआपले सर्वांचे लाडके सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू म्हणजे विविधांगी व वैशिष्ट्यपूर्ण पैलूंनी भरलेले एक अद्वितीय व्यक्तिमत्व ह्या असाधारण व्यक्तिमत्वाचा वेध घेण्याचा एक प्रयास म्हणून, ‘दैनिक प्रत्यक्ष’चे सन २०१२ व २०१३ चे ‘नववर्ष विशेषांक’ ‘मी पाहिलेला बापू’ ह्या विषयाला वाहिलेले होते. बापूंच्या शालेय जीवनापासून ते वैद्यकीय प्रॅक्टिसच्या काळात अनेकविध लोकांना त्यांचे सान्निध्य लाभले. अशा, बापूंच्या सान्निध्यात आलेल्या अनेकविध लोकांच्या, अनिरुद्धांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू दाखविणाऱ्या, त्या काळातील आठवणी त्यांमध्ये शब्दांकित करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर काही मोजक्या व्यक्तिमत्वांच्या, अलिकडील काळातील आठवणींचाही त्यात समावेश करण्यात आला होता. बापूंच्या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारे ‘दैनिक प्रत्यक्ष’चे हे दोन्ही अंक अविस्मरणीय असेच ठरले होते.\nश्रद्धावानांच्या प्रेमळ आग्रहाखातर, ह्या सर्व लेखांचे संकलन असलेले, “मी पाहिलेला बापू” हे पुस्तक ह्या वर्षी गुरुपौर्णिमेच्या मंगल दिनी, म्हणजेच शनिवार, दि. ८ जुलै २०१७ रोजी प्रथम मराठी व हिंदी ह्या दोन भाषांमध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे. आज गुरुवार, दि. ११ मे पासून श्रीहरिगुरुग्राम उपासना केंद्रावर, तसेच शनिवार, दि. १३ मे पासून इतर सर्व उपासना केंद्रांवर ह्या पुस्तकांसाठीची आगाऊ नोंदणी इच्छुक श्रद्धावान करू शकतात. ही आगाऊ नोंदणी करण्याची सोय श्रीहरिगुरुग्राम उपासना केंद्रावर गेट नं.५ समोर उभारलेल्या काउंटरवर करण्यात आली आहे. ह्या पुस्तकाची छापील किंमत रु.३५०/- असेल, परंतु आगाऊ नोंदणी करणार्‍या श्रद्धावानांसाठी हे पुस्तक सवलतीच्या दरात, म्हणजे रु.२००/- ह्या किंमतीला उपलब्ध असेल ह्याची सर्व श्रद्धावानांनी नोंद घ्यावी. पुस्तक प्रकाशित झाल्यावर, आगाऊ नोंदणी केलेल्या श्रद्धावानांना पुस्तकाची प्रत मिळण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येईल. तरी श्रद्धावानांनी कृपया याची नोंद घ्यावी व अधिक माहितीसाठी सदर काउंटरवर संपर्क साधावा.\nईरान मसले पर तनाव बढा\nत्रिविक्रमाची १८ वचने (मराठी)\nत्रिविक्रम के १८ वचन (हिन्दी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=151&Itemid=344&limitstart=9", "date_download": "2018-08-18T08:15:04Z", "digest": "sha1:PWBM2H4Y7E7XTSOI3R5C3GCG3SWABR7P", "length": 7150, "nlines": 35, "source_domain": "saneguruji.net", "title": "यज्ञ", "raw_content": "शनिवार, आँगस्ट 18, 2018\nकृपाळू वरुणदेव, ते आधी विचार करू लागले. वरुण ही नीतीची देवाता. सकल विश्वाचे नियमन करणारी देवता. इंद्र ही युद्धदेवता. विश्वावर संकट आले तर इंद्राने निवारावे. वरुणाने पापपुण्याचा विचार करावा; परंतु जेथे सारे कर्मच लोपले तेथे पापपुण्याचा निवाडा तरी कोणता करावयाचा वरुणदेव महाराज इंद्रला भेटण्यासाठी निघाले.\nइंद्राला कशाचे भान नव्हते. तो आपल्या विलासात दंग होता. इतर देवही तेच करत होते. वरुणदेव आले, परंतु त्यांचे स्वागत करायला कोणी नव्हते. वरुणदेव इंद्राच्या प्रासादाबाहेर येऊन उभे राहिले. इतक्यात काही अप्सरांना ती गोष्ट कळली. त्या घाबरल्या. त्यांनी इंद्राला वार्ता दिली. इंद्र लाजला. नंतर तो बाहेर आला.\n“आज का झाले आगमन मुखश्री अशांत का काही अशुभ वार्ता आहे की काय काही संकट आहे का काही संकट आहे का माझे वज्र आहे. संकटांचा चुरा करीन, सांगा.”\n“महाराज, जगाचे पापपुण्य पाहणे हे माझे कर्म; परंतु ते कसे पार पाडू सारे कर्ममात्र थांबले आहे. बाह्यकर्म थांबले तरी मनात वैचारिक वा वैकारिक कर्म- हे सूक्ष्म कर्म सुरूच असते. मनाचे व्यापार चालूच असतात. त्यांच्यावरूनही मी नियमन केले असते; परंतु विचार करण्याचीही शक्ती मानवी मनाला उरली नाही. माणसे जणू मढी बनली. ना हाताचे व्यापार, ना मनाचे. भूतलावर हाहाकार उडाला आहे. कहर उडाला आहे. पृथ्वी का मरणार सारे कर्ममात्र थांबले आहे. बाह्यकर्म थांबले तरी मनात वैचारिक वा वैकारिक कर्म- हे सूक्ष्म कर्म सुरूच असते. मनाचे व्यापार चालूच असतात. त्यांच्यावरूनही मी नियमन केले असते; परंतु विचार करण्याचीही शक्ती मानवी मनाला उरली नाही. माणसे जणू मढी बनली. ना हाताचे व्यापार, ना मनाचे. भूतलावर हाहाकार उडाला आहे. कहर उडाला आहे. पृथ्वी का मरणार एक काडीही राहणार नाही, चिटपाखरूही उरणार नाही, असे दिसते. सारी उष्णताच संपली. सारे थंडगार झाले. सूर्य दिसत नाही. त्याच्या सहस्त्रावधी प्रकाशधेनू, कोठे गेल्या सा-या एक काडीही राहणार नाही, चिटपाखरूही उरणार नाही, असे दिसते. सारी उष्णताच संपली. सारे थंडगार झाले. सूर्य दिसत नाही. त्याच्या सहस्त्रावधी प्रकाशधेनू, कोठे गेल्या सा-या कोणीतरी असुर मातला असावा. त्याने हा विश्वसंहार मांडला असावा.”\nइंद्रदेव, तुम्ही काय करीत होतात तुम्ही या गोष्टीकडे लक्ष दिले नाही. मागे तुमच्या कानावर कोणीतरी गोष्ट घातली होती, परंतु तुम्ही लक्ष दिले नाही. खानापानात दंग राहिलात. भोग भोगीत राहिलात. परमेश्वर काय म्हणेल तुम्ही या गोष्टीकडे लक्ष दिले नाही. मागे तुमच्या कानावर कोणीतरी गोष्ट घातली होती, परंतु तुम्ही लक्ष दिले नाही. खानापानात दंग राहिलात. भोग भोगीत राहिलात. परमेश्वर काय म्हणेल तुम्ही मुख्य कार्यवाह; परंतु तुम्हीच अदक्ष राहिलात. इंददेवी, बोलतो त्याची क्षमा करा. परंतु तुमच्याही कर्माकर्माचा न्याय माल करावा लागेल. तुम्ही स्वकर्तव्यात अळंटळं कराल तर तुमचेही शासन दुःखाने का होईना, परंतु मला करावे लागेल. विश्वात कोठे काय बिघडते, कोणते विघ्न येत आहे, कोणते संकट येत आहे, इकडे अहोरात्र तुमचे डोळे हवेत. तुम्हाला उगीच का देवेंद्र केले तुम्ही मुख्य कार्यवाह; परंतु तुम्हीच अदक्ष राहिलात. इंददेवी, बोलतो त्याची क्षमा करा. परंतु तुमच्याही कर्माकर्माचा न्याय माल करावा लागेल. तुम्ही स्वकर्तव्यात अळंटळं कराल तर तुमचेही शासन दुःखाने का होईना, परंतु मला करावे लागेल. विश्वात कोठे काय बिघडते, कोणते विघ्न येत आहे, कोणते संकट येत आहे, इकडे अहोरात्र तुमचे डोळे हवेत. तुम्हाला उगीच का देवेंद्र केले मोठे पद म्हणजे मोठी जबाबदारी; परंतु तुम्ही स्वस्थ व सुस्त राहिलात. आज गोष्ट या थराला आल्या. चराचर संपुष्टात आले. प्राणज्योती विझू पाहत आहेत. किती दिवस तुमच्याकडे येईन येईन म्हणत होतो; परंतु हिय्या होईना. आज धैर्य केले. म्हटले, सागावे जाऊन. कर्तव्य हे कठोर असते. देवांनाही कर्तव्यपराङ्गमुख होऊन चालणार नाही. देवांनीही ‘धृतव्रत’ असे राहिले पाहिजे. ऋतसत्याचे परिपालन त्यांनीही केले पाहिजे. इतरांरपेक्षा अधिक कसोशीने केले पाहिजे. आता तरी तुम्ही उठा. शत्रू शिरजोर झाला आहे. तो आहे कोठे, त्याचा तपास काढा. त्याचा नाश करा. त्याला शरण यायला लावा.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-18T09:08:36Z", "digest": "sha1:4J6BCKUSU77WQXYCWI5BT2U6GF3DSCII", "length": 5322, "nlines": 69, "source_domain": "m4marathi.com", "title": "मेहंदी काढताना काही महत्त्वाच्या गोष्टी | m4marathi", "raw_content": "\nमेहंदी काढताना काही महत्त्वाच्या गोष्टी\nसण, उत्सव आणि त्या माध्यमातून होणारे सेलिब्रेशन.. मेहंदीशिवाय अपूर्णच.. मेहंदी काढताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्याच लागतात.\n१) मेहंदींचे डिझाईन ढोबळ मानाने आधीच ठरवा. डिझायनरकडून मेहंदी काढणार असाल तर त्यांच्याशी आधीच संवाद साधा.\n२) मेहंदी शक्यतो रात्रीच रेखाटा. जेणेकरून दिवसभरातली धांदल टाळता येईल.\n३) मेहंदी काढताना प्रथम आउटलेट काढून घ्यावे. त्यानंतरच आतली नाजूक डिझाईन काढावे, जेणेकरून मेहंदी पसरट होणार नाही.\n४) हातावरची मेहंदी काढताना शक्यता दोन्ही हातांना समांतर नक्षी निवडावी अथवा दोन्ही हातांची मिळून एक नक्षी पूर्ण होईल. अशा नक्षींचा प्रयोगही करता येईल.\n५) मेहंदी काढून झाल्यानंतर साधारण १0 मिनिटांनी अर्धे लिंबू आणि चिमूटभर साखरेच्या रसाचे मिश्रण कापसाच्या बोळ्याने हातावर फिरवा.\n६) मेहंदी हातावर वा पायावर किमान ७ ते ८ तास ठेवा, तरच मेहंदी खुलेल आणि जास्त काळ टिकेल.\n७) मेहंदी लावल्यानंतर साधारण पाच तासाने हाताला गोडतेल लावावे.\n८) मेहंदीचा रंग अधिक खुलावा म्हणून मेहंदी धुण्यापूर्वी गरम तव्यावर दोन- चार लवंगा टाकून त्याचा थोडासा धूर होऊ द्यावा. त्यावर मेहंदीचे हात धरावेत. त्यानंतर मेहंदी हलक्या हाताने काढून घ्यावी. त्यानंतरच ती पाण्याने धुवावी.\n९) मेहंदी पाण्याने धुतल्यानंतर लगेचच साबण वा श्ॉम्पूने धुवू नका.\n१0) पायाची मेहंदी काढताना ती बटबटीत वाटणार नाही याची काळजी घ्या, पैंजण, अँकलेटची स्टाईल याला मॅच होईल, असेच मेहंदीचे डिझाईन असू द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=96&Itemid=289", "date_download": "2018-08-18T08:14:36Z", "digest": "sha1:3KAFJFBVOHEKNIP3GETFHZUPKRRPK4XA", "length": 4033, "nlines": 46, "source_domain": "saneguruji.net", "title": "मातृभूमीचा त्याग", "raw_content": "शनिवार, आँगस्ट 18, 2018\nमुक्ता, रुक्मा व विजय परत आली. विजय व मुक्ता यांचे हात एकमेकांच्या हातांत होते.\n'रुक्माकाका, आज तुम्ही आमच्याकडेच झोपा. मला भीती वाटते.' मुक्ता म्हणाली.\n'त्या दुष्टाला कळले तर तो दौडत येईल.' रुक्मा म्हणाला.\nइकडे तो तुरुंग शिलगला, पेटला, पहारेकरी जागे झाले. त्यांनी ग्रामणीस जाऊन सांगितले. तो दातओठ खात आला, तो तुरुंगात आला. तो कोठडीजवळ गेला. कागद पेटले होते. पेटी फोडलेली होती. चोर पळून गेला होता.\n'धावा, त्या थेरडयाच्या घराला वेढा घाला. जा. विजयला जिवंत धरून आणा. जा. आता तो वाचत नाही. सरकारी इमारतीस त्याने आग लावली. आता मर लेका म्हणावे. जा, दौडा.' तो हुकूम देत होता.\nमध्यरात्र झाली होती; परंतु रुक्मा जागा होता. तो धनुष्याच्या बाणांना धार लावीत होता. तो त्याने घोडयांच्या टापांचा आवाज ऐकला. त्याने मुक्ताला हाक मारली. ती उठली. विजय उठला. संकट आले. मुक्ताने काय केले, तेथे एक पेटारा होता त्यात तिने विजयला लपविले. पेटार्‍यावर अंथरूण घातले व ती निजून गेली. घोडेस्वार आले. मशाली पाजळून घरात शिरले.\n'तुम्ही तर त्याला तुरुंगात घातलेत. द्या ना माझा विजय. का छळता त्याला' मुक्ता उठून म्हणाली.\n'विजय इकडे नाही आला\n'तो तर पळून गेला तुरुंगातून.'\nते घोडेस्वार परत निघाले. गेले. विजयने आतून झाकण उघडले. तो बाहेर आला. सर्वांना आनंद झाला.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/ravindra-chavan-criticize-congress-29800", "date_download": "2018-08-18T08:32:39Z", "digest": "sha1:SPEM2W74BZGWNA2T64VHQXTIUVH7X7ET", "length": 16002, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "ravindra chavan criticize congress 'जिल्हा नियोजन'मध्ये कॉंग्रेसची दहशत - रवींद्र चव्हाण | eSakal", "raw_content": "\n'जिल्हा नियोजन'मध्ये कॉंग्रेसची दहशत - रवींद्र चव्हाण\nगुरुवार, 9 फेब्रुवारी 2017\nभावनिक आवाहनाचे दिवस संपले\nजिल्हा परिषद निवडणुका आल्या की, कॉंग्रेसच्या मंडळींकडून नेहमीच भावनिक आवाहने केली जातात. मात्र यंदाच्या निवडणुकीत इथली जनता कॉंग्रेसच्या कुठल्याच भावनिक आवाहनांना बळी पडणार नाही. उलट मतदार पारदर्शक आणि विकासाचे काम करणाऱ्या भाजप उमेदवारांनाच निवडून देतील, असे श्री. चव्हाण म्हणाले.\nकणकवली - स्वपक्षातील उमेदवार कमी पडले म्हणून की काय, कॉंग्रेसने शिवसेना-राष्ट्रवादीच्या सदस्यांना प्रत्येकी 20 लाख रुपये देऊन खरेदी केले. ठेकेदारांशी हातमिळवणी करून जिल्ह्यातील रस्त्यांची वाताहत केली. एवढेच नव्हे तर जिल्हा नियोजन समितीमध्येही दहशत निर्माण केली; मात्र या निवडणुकीत आम्ही जनतेच्या पाठबळावर या भ्रष्टाचाऱ्यांना निपटून काढू आणि जिल्हा परिषदेचा स्वच्छ व पारदर्शक कारभार दाखवून देऊ, असा दावा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे केला.\nयेथील मराठा मंडळ सभागृहात भाजपच्या प्रचाराचा नारळ श्री. चव्हाण यांनी फोडला. भाजपचे उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, प्रदेश चिटणीस राजन तेली यांच्यासह संदेश पारकर, अतुल रावराणे, दीपक सांडव, जयदेव कदम, काका कुडाळकर, रवींद्र शेटये आदी पदाधिकारी उपस्थित होते.\nयानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. श्री. चव्हाण म्हणाले, \"\"कॉंग्रेस आघाडी सरकारने जिल्ह्याचा विकास ठप्प केला होता. सी वर्ल्ड प्रकल्प तर एक इंचही देखील पुढे सरकला नव्हता. देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर सिंधुदुर्गच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. सी वर्ल्ड प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद केली. ज्यांच्या जमिनी या प्रकल्पात जात आहेत, त्यांना बाजारभावाने मोबदला दिला जाणार आहे. केंद्राच्या माध्यमातून विजयदुर्ग बंदर आंतरराष्ट्रीय धर्तीवर विकसित केले जात आहे. त्या अनुषंगाने गोवा एमएमबी, जेएनपीटी यांच्यात लवकरच सामंजस्य करार होईल. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण, कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, विद्युतीकरण आदी अनेक प्रश्‍न आम्ही मार्गी लावत आहोत.''\nते म्हणाले, \"जिल्हा नियोजन समितीमध्ये सदस्य, पदाधिकारी, प्रशासन आणि पत्रकार यांनाच प्रवेश असायला हवा. पण सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये कॉंग्रेस नेत्यांचे बॉडीगार्ड, प्रचंड संख्येने कार्यकर्ते आणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भाजपसह इतर पक्षातील सदस्यांनी नियोजन समितीमध्ये जाणेच सोडून दिले.''\nजिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही स्वबळावरच लढवीत आहोत. भाजप प्रथमच पंचायत समितीच्या 82 आणि जिल्हा परिषदेच्या 45 जागा लढवीत आहे. आज या सर्व सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. आंबेडकर यांना स्मरून पारदर्शक आणि स्वच्छ कारभाराची शपथ घेतली. नगरपालिका निवडणुकांप्रमाणे जिल्हा परिषदेमध्येही भाजपचेच सर्वाधिक उमेदवार निवडून येतील, असेही श्री. चव्हाण म्हणाले. शिक्षणमंत्री विनोद तावडे प्रचारासाठी सिंधुदुर्गात येणार असल्याचे ते म्हणाले.\nभावनिक आवाहनाचे दिवस संपले\nजिल्हा परिषद निवडणुका आल्या की, कॉंग्रेसच्या मंडळींकडून नेहमीच भावनिक आवाहने केली जातात. मात्र यंदाच्या निवडणुकीत इथली जनता कॉंग्रेसच्या कुठल्याच भावनिक आवाहनांना बळी पडणार नाही. उलट मतदार पारदर्शक आणि विकासाचे काम करणाऱ्या भाजप उमेदवारांनाच निवडून देतील, असे श्री. चव्हाण म्हणाले.\nऔरंगाबाद : 'एमआयएम'च्या नगरसेवकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा\nऔरंगाबाद : महापालिकेत एमआयएम नगरसेकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या पाच नगरसेवकांविरोधात शुक्रवारी (ता.17) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयएम नगरसेवक...\nपिंपळवंडीला मानव-बिबट सहजीवन जनजागृती\nजुन्नर - पिंपळवंडी ता.जुन्नर येथे मानव व बिबट संघर्ष व सहजीवन याविषयी मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती करण्यात आली. जुन्नर वन विभाग तसेच...\nताडगाव - मोफत आरोग्य शिबिरात गरिब व आदिवासी नागरीकांनी घेतला लाभ\nपाली - सुधागड तालुक्यातील ताडगाव येथे गुड डुअर्स चैरिटीज मुंबई, टिकेडिके परिसर विकास संघर्ष समिती आणि जय भैरवनाथ युवा मित्र मंडळ ताडगांव यांच्या...\nसैनिकांमुळे आपण सुरक्षित : आमदार औटी\nटाकळी ढोकेश्वर : दिवसरात्र देशाच्या सेवेसाठी व आपल्या संरक्षणासाठी सिमेवर सैनिक दिवसरात्र उभा असतो म्हणुन आपण सुरक्षित वावरत आहोत त्यांचे उपकार...\nपावसमध्येही होमिओपॅथिक हॉस्पिटल उभारू - राऊत\nरत्नागिरी - हार-तुऱ्यांसाठी आमची पदे नाहीत. जनसेवेची आमची भूमिका आहे. १०० टक्के समाजकार्य करून तुमचे आशीर्वाद मिळविण्यातच आम्हाला धन्यता मिळते....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4/%E0%A4%AA-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%86.php", "date_download": "2018-08-18T09:05:19Z", "digest": "sha1:JV7SX37WIV2RSXJSUTGQCKTS2NDYSQZG", "length": 85070, "nlines": 1243, "source_domain": "tarunbharat.org", "title": "प. बंगालमधील बांगलादेशी आक्रमण | Tarun Bharat", "raw_content": "\nवीर संघवी, ज्येष्ठ पत्रकार\nउजव्या विचारसरणीला एक मंच उपलब्ध होईल म्हणून पुद्दुचेरी साहित्य उत्सव रद्द करण्याची डाव्यांची मागणी विचित्र...\nप्रशांत उमराव, वकील, सर्वोच्च न्यायालय\nमेरठमध्ये हेलिकॉप्टरमधून शिवभक्त कावडियांवर फुलांचा वर्षाव करणारे मेरठ भागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांना...\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळात एकाच दिवशी शंभर बळी\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nआयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ\nअजित वाडेकर यांचे निधन\nकेरळमध्ये पावसाचे ७७ बळी; १८ हजार बेघर\nवीर संघवी, ज्येष्ठ पत्रकार\nAll अर्थ कृषी नागरी न्यायालय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nआयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ\nअजित वाडेकर यांचे निधन\nसीआरपीएफला सर्वाधिक शौर्य पदके\nमहाराष्ट्राला ५१ पोलिस पदके\nहवाई दल जवानाच्या वेषात अतिरेकी\nराजीव गांधींनीच नाकारला होता दलितांचा हक्क\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nरस्ता सुरक्षा विषय अभ्यासक्रमात असावा\nडिजिटल व्यवहारांवर २० टक्के कॅशबॅक\nघर, वाहनकर्ज महागले; व्याजदरात ०.२५ टक्क्यांची वाढ\nमहसूल वाढल्याने जीएसटी घटणार\nनिर्देशांक नव्या विक्रमी उच्चांकावर\n‘डिमांड ड्राफ्ट’च्या नियमात बदल\nडॉलरसमोर रुपया सक्षम, मोदी सरकार धैर्यवान\nदेशभर आज जीएसटी दिवस पाळणार\nआर्थिक सल्लागार भारतीय मूल्ये जोपासणारा असावा\nसरकारी बँकांमध्ये लोकांचा पैसा सुरक्षित\nनागरिकांना प्रामाणिकपणे कर भरण्याची विनंती\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nविदर्भ, मराठवाड्यातील आठ सिंचन प्रकल्पांना केंद्राची मदत\nयंदा ९७ टक्के पाऊस\nहमीभावात दीडपट वाढ होणारच\nशेतीपर्यंत पाणी नेण्याची गरज : नितीन गडकरी\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nआयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ\nअजित वाडेकर यांचे निधन\nसीआरपीएफला सर्वाधिक शौर्य पदके\nमहाराष्ट्राला ५१ पोलिस पदके\nहवाई दल जवानाच्या वेषात अतिरेकी\nराजीव गांधींनीच नाकारला होता दलितांचा हक्क\nरस्ता सुरक्षा विषय अभ्यासक्रमात असावा\nछत्तीसगडचे राज्यपाल बलरामजी दास टंडन यांचे निधन\nउच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र\nआंदोलनात कोट्यवधींची संपत्ती नष्ट होणे भीषणच\nराजीव गांधींच्या मारेकर्‍यांना मुक्त करण्यास केंद्राचा नकार\nबार डान्समध्ये अश्‍लील काय\nनॅशनल हेरॉल्ड प्रकरणी राहुल गांधींना दिलासा नाही\nक्रमांक ३ वरच न्या. जोसेफ यांचा शपथविधी\nजम्मू-काश्मीरच्या कलम ३५-ए वर उद्या सुनावणी\nतीन न्यायमूर्तींची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती\nन्यायाधीशपदी नातेवाईकांच्या नियुक्तीला चाप लागणार\nपीडित बालकांच्या कुठल्याही छायाचित्राला प्रसिद्धी नको\nशबरीमलात महिलांनाही प्रवेशाचा अधिकार\nपंतप्रधान मोदींनी दिल्या इम्रान खान यांना शुभेच्छा\nट्रम्प यांना प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे निमंत्रण\nकाश्मीरची बदनामी करणार्‍या रिपोर्टमागे पाकिस्तानचा हात\nकोरियन द्वीपकल्पातील शांतता प्रक्रियेत भारताचा सहभाग\nभारत घेणार रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली\nसेशेल्समध्ये भारत उभारणार नाविक तळ\nऑगस्टावेस्टलँड : दलालाचे प्रत्यार्पण करण्यास इटलीचा नकार\nराष्ट्रपती तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना\nभारत-ब्रिटनमध्ये होणार प्रत्यार्पण करार\nबांगलादेश परत घेणार आपले ३३ घुसखोर\nइराणवरील बंधनांना भारताचा पाठिंबा नाही\nवाटले नव्हते, ही व्यक्ती पंतप्रधान होईल\nपंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा नाही : शरद पवार\nघुसखोरांचे आदरातिथ्य करायचे का\nएक राष्ट्र, एक निवडणुकीला काँग्रेसचा विरोध\nमोदी सरकारविरुद्ध आंदोलन उभारणार\nअमित शाह महिन्यातून तीन दिवस बंगाल मुक्कामी…\n१७ विरोधी पक्षांना हवी मतपत्रिका\n…तर भारतात रक्ताचे पाट वाहतील\nकाँग्रेसने मान्य केला बोफोर्स घोटाळा\nखटल्याच्या भीतीने राहुल यांचे ते भाषणच काढले\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\nबुलेट ट्रेनसाठी बीईएमएल बनवणार सुटे भाग\n‘बुल’ उधळला: विक्रमी उच्चांकावर विराजमान\nकाँग्रेसच्या भीतीने हादरला होता शेअर बाजार\nभारती एअरटेल, पेमेंट बँकेचा ईकेवायसी परवाना रद्द\nदूरसंचार क्षेत्रात ७५ हजार कर्मचार्‍यांना नारळ\nऐतिहासिक… निर्देशांक ३३ हजारी\nगुंतवणूकदार २५ लाख कोटींनी मालामाल\nरजनीशकुमार स्टेट बँकेचे नवे अध्यक्ष\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nभारतातच तयार होणार सुपर हॉर्नेट\nआयआरएनएसएस-१ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nनेव्हिगेशनल उपग्रहाचे उद्या प्रक्षेपण\n‘जी-सॅट-६ ए’ चे यशस्वी प्रक्षेपण\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nसंरक्षण मंत्रालयाकडून व्यवहार नाही\nसीमेजवळ तैनात होणार चिनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॉकेट\nलष्कराला मिळणार ४०० आधुनिक तोफा\nभीष्म व अजेय रणगाड्यांना स्वदेशी इंजीन\nसीआरपीएफ जवानांना नवे बुलेट प्रूफ जॅकेट\nइसिसचा अतिरेकी अडकला गुप्तचर यंत्रणेच्या जाळ्यात\nसौराष्ट्र सीमेवर पाकची लढाऊ विमाने\nकोणत्याही आव्हानासाठी लष्कर सज्ज\nअग्नी-५ लवकरच लष्कराच्या शस्त्रागारात\nजवानांना १० हजार रुपये कापड भत्ता\nसर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ आला समोर\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nरोहिंग्या निर्वासित नसून, बेकायदेशीर घुसखोरच : किरेन…\n६१,१६४ किमी महामार्गाची कामे सुरू\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान :…\nस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\nनोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन\nपाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात\n२१ हजारांपेक्षा जास्त भारतीयांचे अमेरिकेत अनधिकृत वास्तव्य\nइराणविरोधात अमेरिकेचे एकतर्फी कठोर फेरनिर्बंध\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान :…\nस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\nनिवडणूक नियमाचे उल्लंघन, इम्रान खान यांचा लेखी…\nइम्रान खान यांना खासदारकीची शपथ घ्यायला सशर्त…\n६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू\nअंटार्क्टिकात तुटला अतिविशाल हिमनग\nनोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन\nभारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था\nमल्ल्याची इंग्लंडमधील मालमत्ता जप्त करण्याचे आदेश\nरासायनिक शस्त्रास्त्र वापर बंदीसंबंधित परिषदेला भारताचा पाठिंबा\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nकॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा\nमुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी\nराज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड\nमराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार\nसमृद्धी महामार्गासाठी एकराला ५० लाख रुपये\n‘चाकण पेटवणार्‍या’ पाच हजार जणांवर गुन्हा\nकमी शब्दात व धारदार पोस्ट असावी\nआता घेता येणार वारीचे लाईव्ह दर्शन\nकर्जमाफी कायमस्वरूपी तोडगा नाही : उपराष्ट्रपती\nऔरंगाबादेत पाणीयुद्ध; नळ कापण्यावरून दोन गटात भीषण…\nआता अयोध्येत मंदिर बांधण्यासाठी जाणार\nवंचितांना यमगरवाडी प्रकल्पाने मुख्य प्रवाहात आणले: भैय्याजी…\nनांदेड महानगरपालिकामध्ये कॉंग्रेसची सत्ता\nमुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी\nतुम्ही फक्त चित्रपट दाखवण्याचे काम करा\nसत्ता मिळाली नाही तरी चालेल, पण भाजपा…\nभाजपाने काँग्रेस, राकाँ फोडली असती, म्हणूनच सत्तेत…\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे…\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nगामा पैलवानसह सहा आरोपी अटकेत\nआजपासून फिफा विश्‍वचषकाची जादू\n फुलराणीने दिले २६ वे सुवर्णपदक\nभारताची सुवर्णझळाळी; एकाच दिवशी १७ पदकांची लूट\nतेजस्विनी, अनिश, बजरंगला सुवर्ण\nकुस्तीपटूंना दोन सुवर्णांसह चार पदके\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nशेअर बाजार नव्या शिखरावर\nशेअर बाजाराचा बैल उधळला\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nध्रुपद गायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे निधन\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nतेरा वैभव अमर रहे माँ\nतेरा वैभव अमर रहे माँ\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\n७३ टक्के नागरिकांचा पंतप्रधान मोदींवर विश्‍वास\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\n‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित\nचिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार\nप्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\nअटल, अढळ आणि अमर…\nअटलजी आजचे श्यामाप्रसाद आहेत\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nअटल, अढळ आणि अमर…\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\nअटलजी आजचे श्यामाप्रसाद आहेत\nमेरा परिचय : अटलजींच्या काव्यप्रतिभेतून प्रकटलेले हिंदुसूक्त\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन…\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nराष्ट्रीय एकता दिनानिमित्त ‘एकतेसाठी दौड’\nपरराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज भूतानमध्ये\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची श्री मंजुनाथस्वामी मंदिरात…\nदशम: सौंदर्यलहरी पारायणोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरूत\nनरेंद्र मोदी यांचे नवे मंत्रिमंडळ\nनव्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन्\nश्री गजानन महाराजांची पालखी पंढरपूर वारीहून परतली\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम…\nविधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान\nAll ई-आसमंत ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१२ ऑगस्ट १८ आसमंत\n०५ ऑगस्ट १८ आसमंत\n२९ जुलै १८ आसमंत\n२२ जुलै १८ आसमंत\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१५ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१४ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n०९ मे १८ सदाफुली\n२७ डिसेंबर १७ सदाफुली\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१५ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१४ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळात एकाच दिवशी शंभर बळी\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…\nवृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…\nजनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nवृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…\nस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\n►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…\n►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…\nकॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा\n►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…\nमुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी\n►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…\nराज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड\n►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…\nतेरा वैभव अमर रहे माँ\n॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…\n॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…\n॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…\n‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित\nअभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…\nचिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार\nऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…\nसंजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…\nसूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49\nHome » आसमंत, पुरवणी, ब्रि. हेमंत महाजन, स्तंभलेखक » प. बंगालमधील बांगलादेशी आक्रमण\nप. बंगालमधील बांगलादेशी आक्रमण\n॥ राष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन |\nसीमा भागामध्ये मशिदी व मदरशांची संख्या वाढत आहे. शेकडो गावे अशी आहेत, ज्यात आज हिंदू नावालाही शिल्लक नाहीत याचे नव्याने सर्वेक्षण लगेच केले पाहिजे. बांगलादेशी घुसखोरीचा हा भस्मासुर कधीच नष्ट करायला हवा होता. घुसखोरांची समग्र माहिती गोळा करून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल. बांगलादेशी घुसखोरांना मिळालेला मतदानाचा हक्क काढून घेतला पाहिजे. सीमेपलीकडून होणार्‍या घुसखोरीला व दहशतवादाला रोखण्यासाठी कडक उपाय अवलंबले पाहिजेत. मतपेटीच्या राजकारणाला विरोध करावा लागेल. त्यासाठी सातत्याने त्याच्या विरोधात लेखन आणि प्रचार जरुरी आहे.\nबांग्लादेशी घुसखोरांची यादी जाहीर केली तर हिंसाचार :\nबांग्लादेशी घुसखोरांची यादी जाहीर करण्याबाबत मात्र, अनेक देशद्रोही संघटनांनी अशी यादी जाहीर करू नये, केल्यास मोठा हिंसाचार होईल, अशी धमकी सरकारला दिली आहे. २०१५ पासून आसाममध्ये नॅशनल रजिस्टर्स ऑफ सिटीझनमध्ये (एनआरसी) बांग्लादेशी घुसखोरांना शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.\nअर्थातच धमकी देणार्‍यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे आणि शोधलेल्या बांगलादेशी घुसखोरांना बांगलादेशात परत पाठवणे जरुरी आहे. या देशात अशा प्रकारे सामाजिक शांतता धोक्यात आणण्याचा कट कोणी करत असेल, तर अशी कृती मुळीच सहन केली जाणार नाही, हे कठोर कारवाईच्या कृतीतून सांगण्याची गरज आहे. कोणत्याही कारणाने देशाची शांतता आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न कराल, तर कठोर शिक्षेला सामोरे जावे लागेल, असे यांना अगदी कृतीने बजावण्याची गरज आहे.\nदेशात दर दहा वर्षांनतर जनगणना होते. त्यानंतर रजिस्टर्स ऑफ सिटीझन्स तयार केले जाते. नागरिकांची नावे आणि त्यांची सर्व माहिती या रजिस्टरमध्ये असते. आता या रजिस्टरनुसार बांगलादेशी घुसखोरांना आसाममध्ये शोधले जात आहे. त्यानुसार एनआरसीमध्ये नाव नसलेल्या लोकांना बेकायदेशीर घुसखोर म्हणून देशाबाहेर पाठवले जाईल. जे हिंदू पाकिस्तान किंवा बांग्लादेशात अत्याचाराला कंटाळून भारतात पळून आले त्यांना बेकायदेशीर घुसखोर मानले जाणार नाही आणि त्यांना भारतामध्ये वसवण्यात येईल.\nमोठ्या प्रमाणात पश्‍चिम बंगालमध्ये घुसखोरी :\n१९५१ साली पश्‍चिम बंगालची लोकसंख्या ८० टक्के हिंदू होती आणि १८ टक्के मुसलमान होती. मात्र, २०११ साली लोकसंख्या ७२ टक्के हिंदू आहे आणि २५ टक्के मुसलमान आहेत. २०१८ मध्ये बांगलादेशी मुसलमानांची संख्या ३० टक्के झाली असण्याची शक्यता आहे. आता आसाममध्ये घुसखोरी करणे कठीण झाले असले तरी मोठ्या प्रमाणात घुसखोरी पश्‍चिम बंगालमध्ये होत आहे.\nराज्य सरकार व बांगलादेशी घुसखोरी :\nबंगालचे बांगलादेशीकरण करण्यासाठी डीजेएमआय व आयएसआयने मिळून पश्‍चिम बंगालच्या लोकसंख्येची प्रतवारी बदलण्याचा पद्धतशीर प्रयत्नाला मदत केली. भारतीय नागरिक असल्याची कागदपत्रे, शिधावाटप पत्रिका, मतदार ओळखपत्रे मिळवून बांगलादेशी घुसखोर भारतात स्थायिक झाले आहेत. पश्‍चिम बंगालमधील २९४ विधानसभा मतदारसंघांपैकी ५४ मतदार संघांमध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या खूपच जास्त आहे. ४० विधानसभा मतदारसंघ असे आहेत, की जिथे बंगालदेशी घुसखोरांच्या मतांवर निवडणुकांतील उमेदवारांचे भवितव्य ठरते. राज्यातील सरकार यांचा पाठिंबा तसेच बांगलादेशी घुसखोरांची एकगठ्ठा मते मिळविण्यासाठी पश्‍चिम बंगालमधील सर्व (बीजेपी सोडून) राजकीय पक्षांनी दिलेला पाठिंबा यामुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे.\nजिथे घुसखोर जास्त तिथे इस्लामी कट्टरपंथी संघटना सक्रिय आहेत व दहशतवादी कृत्यांना बळ देत आहेत. भारत-बांगलादेश सीमेवर आज हजारो मदरसे बांधून तयार आहेत. याची गंभीर दखल घेतली न गेल्यास याचे भयंकर परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागणार आहेत.\nबांगलादेशी घुसखोरांना हात लावूनच दाखवा\nदेशात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावू, अशी भूमिका नरेंद्र मोदी यांनी घेतल्यानंतर, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बांगलादेशी नागरिकांना हात लावूनच दाखवा, असे आव्हान मोदी यांना दिले. कारण साफ आहे. केंद्र सरकारने बांगलादेशींना पकडण्याचे आदेश दिले होते. त्या वेळी ममता बॅनर्जी यांनी या पकडलेल्या बांग्लादेशींना पश्‍चिम बंगालमध्ये पाठवावे, असे सांगितले होते.\nपश्‍चिम बंगालमध्ये मदरशांची संख्या अफाट :\nमदरशांच्या माध्यमातून धार्मिक शिक्षण देण्याच्या नावाखाली हिंदू आणि भारताविरोधात विखारी शिक्षण येथील लहान मुलांना देण्यात येते. मुळात राज्य सरकारकडे नोंदणीकृत असलेल्या मदरशांची संख्या ५०० इतकीच आहे. मात्र, पश्‍चिम बंगालमध्ये चार हजार मदरशांची उभारणी आतापर्यंत झाली आहे. सरकारी यंत्रणेचा वरदहस्त असल्याशिवाय ही संख्या वाढणे शक्यच नाही. २०१८-१९ च्या निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून केलेले हे षडयंत्र आहे. देशविघातक कारवाया शिकवणार्‍या या मदरशांच्या कामांवर लक्ष ठेवले पाहिजे. मदरशात पोषित करण्यात येणार्‍या धार्मिक उग्रवादावर जेव्हा चिंता व्यक्त करण्यात येते, तेव्हा अनेक राजकीय पक्ष कट्टरवादी वर्गाच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतात. मदरशांना मुख्य प्रवाहातील शाळांच्या बरोबरीने दर्जा देण्याचे समर्थन करतात. मदरशांना संगणक आणि तांत्रिकदृष्ट्या सुसज्ज करणे जिहादी मानसिकतेला आधुनिक अस्त्र-शस्त्र उपलब्ध करून देणे आहे. ममता बॅनर्जी यांनी कट्टरपंथीयांचे तुष्टीकरण चालवले आहे. हजसाठी दरवर्षी किमान एक हजार कोटी रुपयांची सब्सिडी, पश्‍चिम बंगालमध्ये इमामांसाठी विशेष सुविधा, मदरशासाठी सरकारी मदत हे सर्व भारताला अखेर कुठे घेऊन जाणार आहे\nबांगलादेशी घुसखोरी कशी थांबवता येईल\nस्थानिक राजकारण्यांचे प्रतिनिधी, नोकरशहा व पोलिस; ज्यांनी शिधावाटपपत्रिका, मतदार ओळखपत्रे, मतदार यादीत नाव नोंदवून घेणे, भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध करणारी कागदपत्रे करून देण्याचे दुष्कृत्य केले त्यांना शिक्षा झाली पाहिजे. तसेच सौदी अरेबिया, कुवैत व अन्य इस्लामी देशांकडून बेकायदा मार्गाने मोठ्या प्रमाणावर जो निधी पुरविला जातो तो थाबंवला पाहिजे.\nसीमा व्यवस्थापन, विकास कार्यक्रमाची व्याप्ती, सीमांचे रक्षणदलाची कार्यक्षमता वाढविण्याची आवश्यकता आहे. सीमा व तिला लागून असलेला भूप्रदेश यांच्यातील सलगता व संपर्कात वाढ व्हायला हवी. या सीमेवरील इंटिग्रेटेड चेक पॉइंटची उभारणी, त्यांचे व्यवस्थापन व निगराणीची/जपणुकीची व्यवस्था यांची शक्यतो लवकर अंमलबजावणी व्हायला हवी.\nसंपूर्ण देशात बांगलादेशी घुसखोरी विरोधी अभियान :\nअनेक नागरिक, घुसखोर ज्यांच्याकडे पुरावे नाहीत, ते एनआरसीमध्ये नाव नोंदवतच नाहीत आणि लपून राहतात. त्यातील अनेकांनी पश्‍चिम बंगालमध्ये यशस्वी प्रवेश केला आहे. कारण पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी अशा प्रकारच्या तपासणीला विरोध केला आहे. त्यामुळे आसामामधील घुसखोर पश्‍चिम बंगालमध्ये आश्रयाला गेले आहेत. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे पश्‍चिम बंगालमध्ये खोटी कागदपत्रे तयार करून भारताच्या इतर राज्यांमध्ये पाठवण्यात येत आहे. मुंबईमध्ये कल्याण, नवी मुंबईत वाशी, विरार या ठिकाणी हजारो बांग्लादेशी घुसखोर काम करत आहेत. त्यामुळे बांग्लादेशी घुसखोरांचा शोध केवळ आसाममध्ये न घेता तो संपूर्ण देशातल्या राज्यांमध्ये घेतला गेला पाहिजे. इतर राज्यांतील सरकारांनीदेखील यामध्ये सहकार्य केले पाहिजे. बिहार, ओरिसामध्ये बांग्लादेशी घुसखोरांविरोधात कोणतेही अभियान राबविले जात नाही. केरळ आणि उत्तरप्रदेशातदेखील बांग्लादेशी सुखरूप राहात आहेत. त्यामुळे बांग्लादेशी घुसखोरांचा शोध घ्यायचा असेल, तर सीमावर्ती ईशान्य भारतातील इतर राज्ये, सागरी सीमेवरील आंध्रप्रदेश, ओरिसा या राज्यांमध्येही शोध अभियान हाती घ्यावे लागेल. संपूर्ण देशात बांग्लादेशविरोधी अभियान सुरू केले तरच बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध मोहीम यशस्वी ठरेल.\nसीमा भागामध्ये मशिदी व मदरशांची संख्या वाढत आहे. शेकडो गावे अशी आहेत, ज्यात आज हिंदू नावालाही शिल्लक नाहीत याचे नव्याने सर्वेक्षण लगेच केले पाहिजे. बांगलादेशी घुसखोरीचा हा भस्मासुर कधीच नष्ट करायला हवा होता. घुसखोरांची समग्र माहिती गोळा करून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल. बांगलादेशी घुसखोरांना मिळालेला मतदानाचा हक्क काढून घेतला पाहिजे. सीमेपलीकडून होणार्‍या घुसखोरीला व दहशतवादाला रोखण्यासाठी कडक उपाय अवलंबले पाहिजेत. मतपेटीच्या राजकारणाला विरोध करावा लागेल. त्यासाठी सातत्याने त्याच्या विरोधात लेखन आणि प्रचार जरुरी आहे. जनगणनेच्या आकडेवारीचा आधार घेऊन मतदारांची संख्या जाहीर करावी, मत बँकेचे राजकारण टाळण्यासाठी राजकारण्यांना आवाहन करणे आणि निवडणूक आयोगाने नेमलेल्या विशेष समितीतर्फे मतदारांच्या यादीवर लक्ष ठेवणे, हे उपाय योजता येतील. जे बांगलादेशी भारतात घुसले आहेत, त्यांना शोधून काढण्याचे प्रयत्न झाले पाहिजे. देशाच्या सुरक्षेची चाड असणार्‍या सर्व पक्षांनी हा धोका वेळीच ओळखला पाहिजे. आसाम आणि लगतच्या राज्यांनाही घुसखोरमुक्त राज्ये बनवू, अशी घोषणा केली पाहिजे. एकाही घुसखोराला तिकीट देणार नाही, हेही जाहीर केले पाहिजे. येणार्‍या काळात आपण आपला मतदानाचा अधिकार वापरून आपण घुसखोरसमर्थक पक्षांविरुद्ध मतदान करून या घुसखोरीच्या प्रश्‍नाला वाचा फोडली पाहिजे. २०१८, १९ च्या निवडणुकीत अशी मोहीम सुरू करून राजकीय पक्षांना मोठ्या प्रमाणावर त्यांचे धोरण बदलायला लावण्याची गरज आहे. बांग्लादेशी घुसखोरी, निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा बनवण्याची गरज आहे.\nतेरा वैभव अमर रहे माँ\nनिर्मल हृदय, पवित्र कार्य\nखोटी, पण सोपी उत्तरे\nFiled under : आसमंत, पुरवणी, ब्रि. हेमंत महाजन, स्तंभलेखक.\nआजपासून फिफा विश्‍वचषकाची जादू\n फुलराणीने दिले २६ वे सुवर्णपदक\nभारताची सुवर्णझळाळी; एकाच दिवशी १७ पदकांची लूट\nतेजस्विनी, अनिश, बजरंगला सुवर्ण\nकुस्तीपटूंना दोन सुवर्णांसह चार पदके\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळात एकाच दिवशी शंभर बळी\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nSAMB on मग न्यायाधीशांसाठी तरी का उभे राहायचे\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nमग न्यायाधीशांसाठी तरी का उभे राहायचे\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\n७/१२ प्रभागाचा : सोलापूर महानगरपालिका निवडणूक २०१७\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (150) आंतरराष्ट्रीय (467) अमेरिका (166) आफ्रिका (7) आशिया (259) ऑस्ट्रेलिया (2) युरोप (32) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (1) ई-पेपर (159) ई-आसमंत (59) ई-मराठवाडा (48) ई-सदाफुली (4) ई-सोलापूर (48) कलाभारत (4) किशोर भारत (2) क्रीडा (20) छायादालन (36) ठळक बातम्या (8) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (886) आसमंत (841) मानसी (10) युवा भरारी (9) विविधा (4) सदाफुली (22) फिचर (16) महाराष्ट्र (435) उ.महाराष्ट्र (3) प.महाराष्ट्र (15) मराठवाडा (5) मुंबई-कोकण (87) विदर्भ (11) सोलापूर (17) रा. स्व. संघ (48) राज्य (738) आंध्र (12) ईशान्य भारत (42) उत्तर प्रदेश (100) ओडिशा (3) कर्नाटक (80) केरळ (31) गुजरात (98) गोवा (11) जम्मू-काश्मीर (94) तामिळनाडू (35) दिल्ली (52) पंजाब-हरयाणा (28) बंगाल (31) बिहार-झारखंड (66) मध्य प्रदेश-छत्तीसगड (21) राजस्थान (21) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,864) अर्थ (76) कृषी (25) नागरी (822) न्यायालय-गुन्हे (262) परराष्ट्र (83) राजकीय (261) वाणिज्य (13) विज्ञान-तंत्रज्ञान (35) संरक्षण (143) संसद (126) सांस्कृतिक (18) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (5) संपादकीय (795) अग्रलेख (382) उपलेख (412) साहित्य (11) स्तंभलेखक (1,031) अजय देशपांडे (34) अपर्णा क्षेमकल्याणी (10) अभय गोखले (25) अविनाश कोल्हे (10) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (29) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (45) डॉ.परीक्षित स. शेवडे (30) डॉ.वाय.मोहितकुमार राव (28) डॉ.सच्चिदानंद शेवडे (28) तरुण विजय (9) दत्ता पंचवाघ (10) दीपक कलढोणे (36) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (3) ब्रि. हेमंत महाजन (55) भाऊ तोरसेकर (111) मल्हार कृष्ण गोखले (52) यमाजी मालकर (35) योगानंद काळे (1) रत्नाकर पिळणकर (27) रमेश पतंगे (11) रविंद्र दाणी (57) ल.त्र्यं. जोशी (19) वसंत काणे (18) श्याम परांडे (20) श्याम पेठकर (55) श्यामकांत जहागीरदार (57) श्रीकांत पवनीकर (10) श्रीनिवास वैद्य (48) सतीष भा. मराठे (6) सुधीर पाठक (6) सुनील कुहीकर (52) सोमनाथ देशमाने (34) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (26)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nMore in आसमंत, पुरवणी, ब्रि. हेमंत महाजन, स्तंभलेखक (23 of 1276 articles)\nनिर्मल हृदय, पवित्र कार्य\n॥ संवाद : सोमनाथ देशमाने | रांचीच्या निर्मल हृदय संस्थेतून होत असलेल्या अर्भकांच्या विक्रीच्या घटनेविषयी तर मीडिया अजिबात तोंड उघडणार ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://swarnim-sakhi.blogspot.com/2011/07/blog-post_22.html", "date_download": "2018-08-18T08:17:56Z", "digest": "sha1:EYKTJTEQKO6SCQYQCJDE7XY3EJ6Q4D4U", "length": 8296, "nlines": 124, "source_domain": "swarnim-sakhi.blogspot.com", "title": "Swarnim Sakhi...: आस", "raw_content": "\nओंजळीत तुझ्या मोगऱ्याची फुले\nदिली कुणी नी घेतली कुणी..\nसुगंध माझ्या भोवती परिमळे\nआले कुणी अन गेले कुणी ..\nनभांच्या किनारी धरेचे उसासे\nक्षितीज हा भास वाटे जरी..\nशब्दातुनी रक्त सांडे कुणाचे\nव्यथा जुनी वेदना ही जुनी..\nदिशांध वारा गुज सांगे कुणाचे\nहुंकार हे दाटती अंतरी..\nअज्ञात काहूर हृदयात माझ्या\nअगतिकतेचे हे पाश भवती\nदेई विसावा अखेरच्या क्षणाला\nअसे आस ही माझिया मनी..\nLabels: कविता, सखी, सलीलसीमा\n अन इथे सख्य असेल ते जे जे उत्तम उदात्त सुंदर अश्या सारया हृद्य गोष्टींचे .. कविता... लेख... पुस्तक.. फोटो .. रंग ... रेषा... उकार ..वेलांट्या.. जगण्यातल्या चिमुकल्या क्षणांचे .. मनस्वी नात्यांच्या इंद्रधनुषी गोफांचे.. लडीवाळपणे भवती भवती फेर धरणारया आठवणींचे ... अन अंतरी कस्तुरी सारख्या दरवळणारया मैत्रीचे ... किंवा अगदी पायी टोचणारया काट्याचे .. नि पदर ओढत ओरखडे देणाऱ्या निवडुंगाचे सुद्धा .. या सारया गोष्टींचे सख्य आहे.. म्हणून सखी आहे ...\nसांगता येत नाही ...\nरोज की तरह आ गयी वो... रोज की तरह बच्चा देखता रहा अपनी भूरी आँखे भरके... हाथ उठाये ... दिल भरमाये ... रोज की तरह ... फिर एक बार आस लगा...\nपावसात भिजलेले तन मन माझे उगीचच रुसण्याचे बहाणे हे तुझे क्षणार्धात विरतील दुराव्याचे ढग एकदाच परतुनी माझ्याकडे बघ ... ...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ७\nदिवस सातवा हाही दिवस असाच पहाटे उठतो... आधी गणपतीची रूप डोळ्यात रेखून... मग बाकी काम चालू करतो.. सकाळीच पूजा, आरती करून शेजारया...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग 5\nदिवस पाचवा.. हा दिवस गाजवत येतो तयारी हरतालिकेची अन गणपतीची .. सुरु होतो तोच वाजत गाजत .. पुन्हा एकदा वारी बाजाराची... तयारी हरतालिकेच...\nA Walk In Cloud.... गत वर्षीची कोजागिरी अशी जगजीत सिंगजींच्या गझलेत चिंब भिजलेली होती... \"हाथ छुटे भी तो रिश्ते नाही तोडा करते\" ...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ३\nदिवस तिसरा हा दिवस शुभ्र सकाळचा... किलबिल पक्ष्यांच्या आवाजाने जागा होणारा... शेजारच्या गोठ्यातल्या गाईच्या घुंगुरवाळा आवाजाचा... ...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ४\nदिवस चौथा हा दिवस तसा आरामाचा... सुशेगात उठण्याचा... कामाची घाई विसरून चहा पार्टी करण्याचा.. तळ्याच्या काठावर बसून शांत...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ६\nदिवस सहावा... अन मग हा उत्सवी दिवस उजाडतो भल्या पहाटेच... मूर्ती स्थानापन्न होते सजवलेल्या माटीच्या मखरात...मागे रंगवलेले चित्र आत...\nपदर ... नक्षीदार पदर ... रेशमी साडीचा...बुट्टीदार काठाचा .. जरतारीच्या मोराचा वयात येताना आपसूकच चापून-चोपून खांद्यावर विसावलेला... सौभ...\nहृद्य वाचकगण - Followers\nकविता (27) तुमचे सुद्धा होते का असेच (14) सखी (10) मैं (9) भक्ती (3) गोकुळ (2) होकार (2) निळा शाम (1) निळाई (1) भूल (1)\nशेअर विथ केअर :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%AF%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95", "date_download": "2018-08-18T09:00:23Z", "digest": "sha1:KXCKXJQP7F42XRJMFO4I5MDEF3DQD5S6", "length": 7855, "nlines": 203, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:यथादृश्यसंपादक - विकिपीडिया", "raw_content": "\nअधून मधून परिक्षण संपादने करून पहाण्यास सुरवात करण्याच्या दृष्टीने, नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे.\n’यथादृश्यसंपादक’ तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.\nसध्या विकिपीडियातील अक्षरांतरण ही पद्धत यथादृश्य संपादकात वापरता येते . तुम्ही गुगल क्रोम वापरत असाल तर गुगल इनपुट टूल्स या विस्तारकासह (extension) यथादृश्यसंपादक वापरू शकता. याखेरीज अन्य पद्धत आपल्याला माहित असल्यास तिचा येथे उल्लेख करा, जेणेकरुन अधिकाधिक नवीन लोकांना यथादृश्यसंपादक वापरता येइल.\nयथादृश्य संपादक की जसेदृश्य संपादक[संपादन]\nया दोन शब्दातील अधीक चपखल आणि सुबोध शब्द कोणता या बद्दल चर्चा पानावर चर्चा करण्याचे स्वागत आहे.\nदृश्यसंपादक सजगता मालिका :\nह्या सायटेशन टूलचे मराठी विकिपीडियाच्या दृश्यसंपादकातून वापरले जाण्यासाठी येथे सध्या वापरात साचांसंहीत स्थानिकीकरणात तांत्रिक साहाय्य हवे आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ मे २०१६ रोजी २०:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/shradh-paksha/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87-113092000011_1.html", "date_download": "2018-08-18T09:10:49Z", "digest": "sha1:HZMUIQYEUWNANER7CJX3AKZJR53C2GQN", "length": 12435, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "श्राद्ध करण्यामागील शास्त्रीय कारणे | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nश्राद्ध करण्यामागील शास्त्रीय कारणे\nवेदात प्राण्याच्या सात पिढ्यांचे घनिष्ठ व एकवीस पिढ्यांचे सामान्य संबंध सांगितले आहेत. जन्म 46 सहापिढ्यांचा होतो ज्यात 28 सहपिंड स्वत: चे असतात, 56 मा‍तापितांच्या 6 पिढ्यांचे असतात व बाकी आजोबा-पणजोबांचे असतात. या प्रकारे सात पिढ्यांचे अवशेष रहातात.\nआधुनिक विज्ञानात ही 46 ‍सहपिंडे गुणसूत्रे मानली आहेत त्याचा संबंध 4 पिढ्यापर्यंतच आहे.\nवैदिक व आधुनिक दोन्ही प्रकारानुसार माणसाच्या पूर्वजांच्या (पिढीचा) त्यावर परिणाम होतोच त्याच्या शांतीसाठी श्राद्ध करून आपण आपले जीवन सुखमय बनवावे एवढीच अपेक्षा आहे.\nश्राद्ध करताना या 6 नियमांचे पालन जरूर करा\n2016 मधील कुठले श्राद्ध केंव्हा\nपितरांप्रती कृतज्ञतेचा श्राद्ध पक्ष\nयावर अधिक वाचा :\nश्राद्ध करण्यामागील शास्त्रीय कारणे\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nहिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण\nहिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\nअनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ ...\nप्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण...Read More\nव्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता. कामावर प्रभाव पडेल. अचानक खर्च वाढेल....Read More\nजास्त सहयोग मिळेल. कार्यकुशलतेचा लाभ मिळेल. पारिवारिक लाभ घ्या. नोकरीत विशेष सावधगिरी बाळगा. विश्वासात राहू नये. अनिश्चिततेचे वातावरण. निराशा वाढेल....Read More\n\"आर्थिक नुकसान संभव. कामात गुप्तता राखा. सहयोग मिळेल. संबंध बिघडतील. अव्यवहारिक कामांपासून लांब रहा. आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त ठेवा. मानसिक संतोष...Read More\n\"वैचारिक असंतोष राहील. कामात मन रमणार नाही. तब्बेतीची काळजी घ्या. व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील. आर्थिक जबाबदार्‍या वाढतील. आत्मविश्वास वाढेल. कामात...Read More\n\"आपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिक दृष्‌ टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. अडचणी येतील. सतत...Read More\n\"उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता वाटेल. शत्रुपक्षाच्या कारवाया...Read More\n\"खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. नोकरीत नुकसानी संभव. कामात पारदर्शकता हवी. वैचारिक धारणेत राहू नका....Read More\n\"शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमणार नाही. विश्वास कमी राहील. व्यर्थ ताण जाणवेल. पारिवारिक वाद वाढतील.खर्च...Read More\n\"मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात आत्मविश्वास कमी राहील....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि होऊ शकते. नियंत्रण...Read More\n\"आपल्या प्रयत्नाने उन्नति कराल. धनलाभ होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. आपल्या प्रयत्नांमुळे व्यापारात वृद्धि होईल. नवीन कामांना चालना मिळेल. आपल्या यशाचा...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/movies/welcome-zindagi", "date_download": "2018-08-18T08:15:22Z", "digest": "sha1:3324N4QVBYHEDSA74YXLWP5F5JQ2JWV3", "length": 3176, "nlines": 53, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Welcome Zindagi | Marathi Dhamaal", "raw_content": "\nदिग्दर्शक : उमेश घाडगे\nनिर्माता : अजित साटम, संजय आहुलावालिया, बिभास छाया\nनिर्मितीसंस्था : रूपाली एन्टरटेन्मेन्ट\nकलाकार : स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, मोहन आगाशे, प्रशांत दामले, सतीश आळेकर, महेश मांजरेकर, भारती आचरेकर, राजेश्वरी सचदेव, उर्मिला कानेटकर, विवेक लागू, पुष्कर श्रोत्री, जयंत वाडकर, मुरली शर्मा\nकथा : श्रीजीत मुखर्जी\nपटकथा : गणेश मतकरी\nसंवांद : गणेश मतकरी\nसंगीत दिग्दर्शक : अमितराज, पंकज पडघन, सौमिल- सिध्दार्थ, समीर टंडन\nगीतकार : गुरू ठाकूर, ओमकार मंगेश दत्त, मंदार चोळकर, वरूण लिखीते\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation ‘चिमणी चिमणी’ ला स्वप्नील जोशीचा आवाज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://punerispeaks.com/tag/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C/", "date_download": "2018-08-18T08:38:37Z", "digest": "sha1:OBORYFQTQGJQEMW4473ODYNIE26TQGQO", "length": 2469, "nlines": 59, "source_domain": "punerispeaks.com", "title": "वीज Archives - Puneri Speaks", "raw_content": "\nपावसाळ्यात वीज चमकत असताना घ्यावयाची काळजी\nपावसाळ्यात वीज चमकत असताना घ्यावयाची काळजी वीज एका ठिकाणी फक्त एकाच वेळेस पडते- हा एक गैरसमज असून वीज अनेक ठिकाणी … Read More “पावसाळ्यात वीज चमकत असताना घ्यावयाची काळजी”\nAsian Games 2018: आशियाई क्रीडा स्पर्धा वेळापत्रक, प्रक्षेपण, कबड्डी संघ वेळापत्रक\nपिंपरीत प्रियकराने ‘Shivde, I Am Sorry’ चे ३०० फलक लावले, कोण आहे शिवडे\nअटल बिहारी वाजपेयी माहिती, अटल बिहारी वाजपेयी विशेष , अटल बिहारी वाजपेयी मराठी, अटल बिहारी वाजपेयी कविता\nपुणे तिथे काय उणे: देशात राहण्यासाठी पुणे शहर अव्वल स्थानी\nआरक्षण – एक शोधनिबंध | आरक्षण माहिती | आरक्षण म्हणजे काय\nRaj Thackeray VS Ajit Pawar: पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळ्यात एकमेकांवर टीका, वॉटरकप 2018 विजेते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://swarnim-sakhi.blogspot.com/2011/06/blog-post_20.html", "date_download": "2018-08-18T08:18:24Z", "digest": "sha1:5JQWZCWDAJ4T5WEH6O6FN4IT3UU5XYFD", "length": 11285, "nlines": 153, "source_domain": "swarnim-sakhi.blogspot.com", "title": "Swarnim Sakhi...: काय पाठवू म्हणे ...", "raw_content": "\nकाय पाठवू म्हणे ...\nकाय पाठवू म्हणे ...\nपाठवून दे खुशालीचे एक पत्र ..\nएखादे मोरपीस पुस्तकात दडवलेले ..\nएखादा मोती ... खोल कुठे मनाच्या तळाशी लपलेला ..\nपाठव बासरीची ती धून... जी वाऱ्यावर लहरत तुझा आठव देईल..\nदे एखादी लाट .. जी समुद्राच्या गाजेसारखी झंकारत राहील..\nपाठव ती सुरावट.. जी आकाशाला गवसणी घालून तंबोऱ्याच्या तारांवर रुळली\nअन पाठव ती कविता.. जी तुझ्या नि माझ्या शब्दाशब्दात जुळली\nपाठव तो श्वास.. जो गंध भरला मरवा होऊन माझ्याभवती दरवळला\nअन तो आभास.. जो काळोखाच्या क्षणीही तुझा भास होऊन सोबत वावरला\nपाठव ते क्षण जे एकत्र घालवले ..\nअन ते ही .. जे विलग होऊन तुझी वाट बघण्यात गेले\nपाठवून दे तुझे अवघे असणे जे माझ्या आयुष्याची आस आहे\nअन पाठव माझे ही जगणे जे सतत तुझ्या आसपास आहे\nपाठवून दे न एक स्वप्नीलसा होकार ...\nसारे आयुष्य तरंगेल त्यावर...\nकाही श्वासांचेच तर अंतर..\nजर नसेलच ह्यातील काहीही तुझ्याकडे ...\nतर मग पाठव एक सोपा नकार..\nकसल्याही किल्मिषांची पुटे न चढवता ...निराकार ..\nमी प्रयत्न करेन मग शोधायचा...\nकी पुढे कसे भागावा आयुष्याचा शुन्याकार...\nपण शून्याला भाग जात नाही.. असे तूच म्हणाला होतास ना... \nLabels: भक्ती, मैं, शुन्याकार, सखी, होकार\nचला, तुझा ब्लॉग सुरु झाला तर एकदाचा :)\nए खरंच खुप छान आहे गं ही कविता मला जाम आवडली \nखूपच छान..... मस्त मस्त\nजर नसेलच ह्यातील काहीही तुझ्याकडे ...\nतर मग पाठव एक सोपा नकार..\nकसल्याही किल्मिषांची पुटे न चढवता ...निराकार ..\nमी प्रयत्न करेन मग शोधायचा...\nकी पुढे कसे भागावा आयुष्याचा शुन्याकार...\nपण शून्याला भाग जात नाही.. असे तूच म्हणाला होतास ना... \nतुमच्या शुभेच्छा अन् प्रतिक्रिया ...सूचना सगळे नेहमीच स्वागतार्ह आहे ..\n अन इथे सख्य असेल ते जे जे उत्तम उदात्त सुंदर अश्या सारया हृद्य गोष्टींचे .. कविता... लेख... पुस्तक.. फोटो .. रंग ... रेषा... उकार ..वेलांट्या.. जगण्यातल्या चिमुकल्या क्षणांचे .. मनस्वी नात्यांच्या इंद्रधनुषी गोफांचे.. लडीवाळपणे भवती भवती फेर धरणारया आठवणींचे ... अन अंतरी कस्तुरी सारख्या दरवळणारया मैत्रीचे ... किंवा अगदी पायी टोचणारया काट्याचे .. नि पदर ओढत ओरखडे देणाऱ्या निवडुंगाचे सुद्धा .. या सारया गोष्टींचे सख्य आहे.. म्हणून सखी आहे ...\nतुमचे सुद्धा होते का असेच...\nये कैसा सवाल ..\nकाय पाठवू म्हणे ...\nरोज की तरह आ गयी वो... रोज की तरह बच्चा देखता रहा अपनी भूरी आँखे भरके... हाथ उठाये ... दिल भरमाये ... रोज की तरह ... फिर एक बार आस लगा...\nपावसात भिजलेले तन मन माझे उगीचच रुसण्याचे बहाणे हे तुझे क्षणार्धात विरतील दुराव्याचे ढग एकदाच परतुनी माझ्याकडे बघ ... ...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ७\nदिवस सातवा हाही दिवस असाच पहाटे उठतो... आधी गणपतीची रूप डोळ्यात रेखून... मग बाकी काम चालू करतो.. सकाळीच पूजा, आरती करून शेजारया...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग 5\nदिवस पाचवा.. हा दिवस गाजवत येतो तयारी हरतालिकेची अन गणपतीची .. सुरु होतो तोच वाजत गाजत .. पुन्हा एकदा वारी बाजाराची... तयारी हरतालिकेच...\nA Walk In Cloud.... गत वर्षीची कोजागिरी अशी जगजीत सिंगजींच्या गझलेत चिंब भिजलेली होती... \"हाथ छुटे भी तो रिश्ते नाही तोडा करते\" ...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ३\nदिवस तिसरा हा दिवस शुभ्र सकाळचा... किलबिल पक्ष्यांच्या आवाजाने जागा होणारा... शेजारच्या गोठ्यातल्या गाईच्या घुंगुरवाळा आवाजाचा... ...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ४\nदिवस चौथा हा दिवस तसा आरामाचा... सुशेगात उठण्याचा... कामाची घाई विसरून चहा पार्टी करण्याचा.. तळ्याच्या काठावर बसून शांत...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ६\nदिवस सहावा... अन मग हा उत्सवी दिवस उजाडतो भल्या पहाटेच... मूर्ती स्थानापन्न होते सजवलेल्या माटीच्या मखरात...मागे रंगवलेले चित्र आत...\nपदर ... नक्षीदार पदर ... रेशमी साडीचा...बुट्टीदार काठाचा .. जरतारीच्या मोराचा वयात येताना आपसूकच चापून-चोपून खांद्यावर विसावलेला... सौभ...\nहृद्य वाचकगण - Followers\nकविता (27) तुमचे सुद्धा होते का असेच (14) सखी (10) मैं (9) भक्ती (3) गोकुळ (2) होकार (2) निळा शाम (1) निळाई (1) भूल (1)\nशेअर विथ केअर :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://dateycollege.in/", "date_download": "2018-08-18T08:15:45Z", "digest": "sha1:7KYE7DUVKNFUCS23MMLDHRAEDCJ2OZFB", "length": 4759, "nlines": 72, "source_domain": "dateycollege.in", "title": "बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ - Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal", "raw_content": "बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ\n(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित )\nअंतराळातील ग्रहांविषयी सजग व्हा\nबाबाजी दाते महाविद्यालयातील भूगोल अभ्यासमंडळाच्या उद्घाटन प्रसंगी खगोलशास्त्र अभ्यासकांचे आवाहन ‘सूर्यमालेतील शनी व मंगळा सारखे ग्रह पृथ्वी पासून लक्षावधी की.मी. अंतरावर आहेत. आपल्या आयुष्यातील छोट्या मोठ्या घटनांवर त्यांचे अनिष्ट परिणाम होत नसतात’, हे वैज्ञानि...\nसुरक्षित जीवन व कायदे या विषयावर जनजागृती कार्यक्रम\nजिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व रिसोर्स सेल फॉर जुवेनाईल जस्टीस व बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे ३१ जुलै २०१८ रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता मुलांचे सुरक्षित ज...\n“सत्र पध्दतीमध्ये राज्यशास्त्र विषयाचा बदलता अभ्यासक्रम”\nस्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात “राज्यशास्त्र विषयाच्याबदलत्या अभ्यासक्रम सत्र पद्धती “ या विषयावर विद्यापीठ स्तर्रीय एकदिवसीय कार्यशाळl दिनांक १३/०८/२०१८ ला संपन्न झाली कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे श्री सतीश फाटक, उपाध्यक्ष वाणिज्य...\nCopyright © 2018 बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/ctet-exam-20-languages-124556", "date_download": "2018-08-18T08:47:59Z", "digest": "sha1:FTIC65WFBJ5QJV6XK25W7OFMI5OMRZR5", "length": 10540, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "CTET Exam In 20 Languages सीटीईटी परीक्षा वीस भाषांतून होणार | eSakal", "raw_content": "\nसीटीईटी परीक्षा वीस भाषांतून होणार\nमंगळवार, 19 जून 2018\nकेंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) ही 20 भारतीय भाषांत घेण्याचे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सीबीएसईला दिले आहेत.\nनवी दिल्ली : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) ही 20 भारतीय भाषांत घेण्याचे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सीबीएसईला दिले आहेत.\nसीबीएसईने परीक्षेच्या पर्यायी यादीतून तमिळ, मल्याळम, तेलुगू, कन्नड, गुजराती, बंगाली यांसह 17 भाषा वगळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयावर टीका झाल्याने जावडेकर यांनी वीस भाषांत प्रवेश परीक्षा होणार असल्याचे सांगितले. या संदर्भात जावडेकर यांनी ट्विट केले आहे.\nप्रवेश परीक्षा ही इंग्लिश, हिंदी, आसामी, बांगला, गारो, गुजराती, कन्नड, खासी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, मिझो, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू, तिबेटियन, उर्दू भाषेत होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तत्पूर्वी द्रमुकच्या नेत्या कनिमोळी यांनी सीबीएसईच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.\nपिंपळवंडीला मानव-बिबट सहजीवन जनजागृती\nजुन्नर - पिंपळवंडी ता.जुन्नर येथे मानव व बिबट संघर्ष व सहजीवन याविषयी मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती करण्यात आली. जुन्नर वन विभाग तसेच...\nनोटा बदलवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश\nरावेर : जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा बदलून देणाऱ्या गुजरातमधील टोळीस इंदूरमध्ये मध्य प्रदेश पोलिसांनी आज पकडले. या टोळीत रावेर, भुसावळच्या...\nविद्यार्थ्यांची जबाबदारी शिक्षकांबरोबर पालकांचीही - प्राध्यापक पंकज गावडे\nनवी सांगवी (पुणे) - \" चारित्र्यवान साने गुरूजींचे जीवन हे त्यांच्या शिक्षकांबरोबर त्यांची वात्सल्यसिंधु आईच्या संस्कारामुळे घडले, त्यामुळे...\nसमस्या सोडवण्यासाठी नाशिकला भरणार शिक्षकांचा दरबार\nयेवला - शिक्षकांच्या विविध रखडलेल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी नाशिकमध्ये विभागातील शिक्षकांचा शिक्षक दरबार गुरुवारी (ता.२३) आयोजित करण्यात आला...\nगुरुजींच्या खात्यावर पेन्शन जमा\nकोरेगाव - सातारा जिल्ह्यातील १२ हजारांवर सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे जुलै महिन्याचे सेवानिवृत्ती वेतन अखेर मंगळवारी (ता. १४) तालुका पातळीवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/family-doctor/family-doctor-750th-issue-h-v-sardesai-article-115501", "date_download": "2018-08-18T08:43:48Z", "digest": "sha1:GXWAGWH7UBX6EP7XBC6QTOHOL6RW55SA", "length": 17998, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "family doctor 750th issue H V sardesai article महत्त्वाच्या तीन गोष्टी | eSakal", "raw_content": "\nडॉ. ह. वि. सरदेसाई\nशुक्रवार, 11 मे 2018\nउपचारांच्या यशात महत्त्वाचा वाटा असतो ‘निदाना’चा. ‘निदाना’च्या विविध पैलूंबाबत रुग्णांनाही माहिती असली पाहिजे.\nयशस्वी उपचाराचा पाया ‘अचूक निदान’ आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेर अमेरिकेतील बॉस्टन येथे सर विल्यम ऑस्लट नावाचे एक विख्यात धन्वंतरी होऊन गेले. त्यांच्या व्यावसायिक यशाचे रहस्य काय आहे, असे त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांनी विचारले असता, त्यांनी दिलेले उत्तर शंभर वर्षांनीही तितकेच मार्मिक आहे. डॉक्‍टरसाहेब म्हणाले, ‘‘माझ्या यशाचे रहस्य तीन गोष्टी जाणण्यात आहे. पहिली म्हणजे रुग्णाच्या विकाराचे निदान. कारण, निदान केल्याखेरीज रुग्णाला कोणता उपचार सुचवावा, हे मला कळणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे परत निदान. कारण, रुग्ण बरा झाला आहे, की त्याला नुसते बरे वाटते आहे, यावर किती काळ उपचार चालू ठेवणे आवश्‍यक आहे हे ठरवावे लागते. ते केवळ निदान समजले तरच शक्‍य आहे आणि तिसरी व शेवटची गोष्ट म्हणजे परत निदान. कारण, रुग्णासंबंधी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे निदान समजले तरच मला देता येतात, तेव्हा वैद्यकीय व्यावसायिक यशाचे रहस्य म्हणजे निदान, निदान आणि निदान हेच आहे.’’ या निदानाच्या शरीरक्रियात्मक, शरीररचनात्मक, विकृतीचे ज्ञान होणे आणि मूळ कारणाची मीमांसा (फिजिऑलॉजिकल डायग्नोसिस, ॲनॉटॉनिकल डायग्नोसिस, पॅथालॉजिकल डायग्नोसिस, इंटिओलॉजिकल डायग्नोसिस) अशा चार पैलूंची माहिती असणे आवश्‍यक आहे.\nयापैकी पहिली पायरी शरीरक्रियांत कोणते बदल झाले आहेत, हे जाणून घेण्याची. हा निदानाचा पाया होय. रुग्णाच्या तक्रारीचं निवारण करण्याकरिता शरीरक्रियेत झालेले बदल जाणून ते दुरुस्त करणे आवश्‍यक आहे. एखादा रुग्ण धाप लागते, अशी तक्रार करतो. ही धाप श्‍वासनलिका आकुंचित पावल्यामुळे लागत आहे, की फुफ्फुसांत पाणी साठल्यामुळे लागत आहे, याचा निर्णय रुग्णाला तत्काळ आराम देण्याच्या दृष्टीने नितांत महत्त्वाचा असतो. श्‍वासनलिका आकुंचित होत असल्या (ब्रॉन्कोस्पाझम), तर या नलिका रुंदावण्याची औषधे (ब्राँकोडायलेटरर्स) वापरून लगेच बरे वाटेल. फुफ्फुसांत पाणी साठत असेल (पल्मेनरी कंजेक्‍शन अथवा एडिया), तर लघवी जास्त होण्याची (डाययुरेटिक्‍स) द्यावी लागतील. रुग्णाच्या जीवन-मृत्यूचे सगळे प्रश्‍न शरीरक्रियांशी निगडित असतात. प्राणवायूचा पुरवठा होणे न होणे, रक्तशर्करा खूप वाढणे अथवा फारच कमी होणे, एखाद्या अवयवाला रक्तपुरवठा कमी होणे किंवा अतिरेकी पूर आल्यासारखा होणे. काही क्षार कमी किंवा जास्त होणे हे शरीरक्रियांचे बदल तातडीने जाणणे आवश्‍यक असते. यात दिरंगाई झाली, तर रुग्ण मृत्युमुखी पडू शकतो. यास्तव शरीरक्रियात्मक बदलांचे निदान हा सर्व उपचारांचा पाया असतो. हे निदान न करता केवळ मूळ कारणाची मीमांसा करणे कधीही योग्य होणार नाही. चयापचयांत होणारे बदल (मेटॅबॉलिक चेंजेस), रक्तवाहिन्यांची क्षमता, रक्तघटकांतील बदल, हातापायांच्या मज्जातंतूचे कार्य समजणे हे सारे शरीरक्रियात्मक विकाराचे भाग असतात. शरीरक्रियात्मक निदान महत्त्वाचे; परंतु तेथे निदानाच्या प्रक्रियेची सुरवात झाली, हे लक्षात ठेवले पाहिजे. धाप लागते ती श्‍वासनलिकांच्या दोषामुळे, का हृदयविकाराने, का रक्तक्षय झाल्याने, का थायरॉईड ग्रंथीच्या आजाराने, का फुफ्फुसाच्या कमकुवतपणाने हे जाणणे महत्त्वाचे आहे. शरीराच्या कोणत्या अवयवात कोठे दोष आहे, हे कळल्याखेरीज तो दुरुस्त कसा करता येईल हृदयाची झडप अरुंद झाली असली तर रुंदावता येईल, रक्तवाहिनी अरुंद होऊन बंद पडली तर त्यात फुगा सरकवून ती रुंदावता (अँजिओप्लास्टी) येईल, अचूक ठिकाणी हाड मोडले आहे हे कळले, की ते सांधले जाण्याकरिता काय करावे, ते ठरविता येईल. शरीराला फुगवटा आला, तर तो भाग, तेथील स्नायू व इतर आवरणे कमजोर झाल्याचे कळले तर (हर्निया) त्याची शस्त्रक्रिया करता येईल. किंबहुना कोणतीही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी शरीररचनेत झालेला बदल अचूक कळणे अत्यंत आवश्‍यक आहे. कोठे दोष सापडतो आहे का, यादृष्टीने शोधत राहण्याची शस्त्रक्रिया केव्हाही निदानानंतर केलेल्या शस्त्रक्रियेपेक्षा गौणच मानली पाहिजे; केवळ आपद्‌धर्म म्हणूनच स्वीकारली पाहिजे. विकृतीचे निदान करण्याकरिता कोणत्या भागाचा तपास करायचा, फोटो कुठले आणि कसले काढायचे, विविध स्कॅन्स कोणत्या भागाचे करायचे, हे ठरविण्याकरिता रुग्णाच्या बिछान्याशेजारी केलेले निदानच महत्त्वाचे असते. हे सत्य नजरेआड करून चालत नाही.\nडॉ. ह. वि. सरदेसाई\nसंग्रामपूर : वाण धरण ६५ टक्के भरले\nसंग्रामपूर : सातपुडा पर्वतामधील तीन जिल्ह्यांसाठी जलसंजीवनी ठरलेले वाण धरण 65 टक्के भरले आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या ...\nबारामती - विद्या प्रतिष्ठानच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पुरस्कार\nबारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nपंकज भूसे यांचा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव\nसरळगांव - महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी होऊन दिलेल्या उद्दिष्टा पेक्षा जास्त वृक्ष लागवड करून उत्कृष्ट कामगिरी केल्याने...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/marathakrantimorcha-maratha-reservation-132548", "date_download": "2018-08-18T08:44:01Z", "digest": "sha1:SEECTO5LD6YKHD6SXSPI5XZQQZCSTTD6", "length": 18688, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "#MarathaKrantiMorcha maratha reservation #MarathaKrantiMorcha औरंगाबादेतून घोंगावणार मराठा मोर्चाचे वादळ | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha औरंगाबादेतून घोंगावणार मराठा मोर्चाचे वादळ\nरविवार, 22 जुलै 2018\nऔरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चाची जेथून मुहूर्तमेढ रोवली गेली त्या औरंगाबाद शहरातूनच पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला शनिवारपासून (ता. २१) सुरवात झाली आहे. क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला साक्षी ठेवत एकवटलेल्या समाजबांधवांनी हा लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्‍त केला. त्यामुळे येथून पुन्हा एकदा मराठा मोर्चाचे वादळ घोंगावणार असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.\nऔरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चाची जेथून मुहूर्तमेढ रोवली गेली त्या औरंगाबाद शहरातूनच पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला शनिवारपासून (ता. २१) सुरवात झाली आहे. क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला साक्षी ठेवत एकवटलेल्या समाजबांधवांनी हा लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्‍त केला. त्यामुळे येथून पुन्हा एकदा मराठा मोर्चाचे वादळ घोंगावणार असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.\nकोपर्डी येथील घटनेचा निषेध आणि मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी पहिल्या मोर्चाची सुरवात येथूनच झाली होती. येथे ठरलेली आचारसंहिता राज्यभरातील ऐतिहासिक ५८ मोर्चांमध्ये पाळली गेली. त्यानंतर अनेक दिवस उलटूनही सरकारने मागण्या मान्य तर केल्याच नाहीत; उलट काही जणांना हाताशी धरून समाजातील आंदोलकांमध्ये फूट पाडण्याचा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केला जात आहे.\nदुसऱ्या टप्प्यातील मराठा क्रांती ठोक मोर्चाला परळीतून सुरवात झाल्यानंतर शनिवारी औरंगाबाद येथून पुन्हा एकदा ठिय्या आंदोलनाची हाक देण्यात आली. गृहीत धरले जात असल्याचा राग मनात असल्याने समाजातील तरुण, नागरिकांनी सकाळपासूनच क्रांती चौक येथे या आंदोलनात सहभाग नोंदवण्यास सुरवात केली. तसेच जिल्हाभरातून समाजबांधव मोठ्या संख्येने यात सहभागी होणार असल्याने आंदोलनस्थळीच त्यांची मुक्‍कामाची सोय व्हावी, यासाठी मंडपही टाकण्यात आला आहे. अनेकांनी सोबत भाजी-भाकरीदेखील आणली.\nदुपारी १२ वाजेच्या सुमारास निदर्शनाने आंदोलनास सुरवात झाली. यावेळी सरकारवर कठोर शब्दांत ताशेरे ओढत तासभर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी सिडको परिसरात बैठक झाली होती. त्यानुसार क्रांती चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन, उपोषण आणि निदर्शने करण्यात आली आहेत. यापुढील आंदोलने शांतपणे होणार नाहीत, त्यामुळे आता वेगळेपणा असायला हवा. आक्रमकपणा दाखवावाच लागेल, त्याशिवाय सरकारला ताकद कळणार नाही, अशी भूमिकाही काही जणांनी मांडली.\nपहिल्या क्रांती मोर्चाची सुरवात येथूनच झाल्याने दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जोरदार लढाई उभी करण्याची तयारी समन्वयकांनी केली आहे. त्यासाठी तालुका, सर्कल, गावपातळीवर संपर्क साधलेला आहे. त्यामुळे येथून सुरवात झालेले आंदोलन लक्षवेधी ठरेल, अशी रणनीती आखली जात आहे.\nआषाढी एकादशीपूर्वीच निर्णय घ्या\nमराठा समाजाला झुलवत ठेवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना वारकरी, कष्टकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पांडुरंगाची पूजा करू न देण्याचा निर्णय असंख्य जणांनी घेतला आहे. काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी राज्य सरकारच जबाबदार असेल, असेही यावेळी जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या पंढरपुरात येण्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे एकतर आषाढी एकादशीपूर्वीच मागण्या मान्य कराव्यात; अन्यथा समाजाच्या रोषाला सामोरे जाण्याची हिंमत ठेवावी, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे.\nबीड - परळीत ठिय्या चौथ्या दिवशीही सुरूच, जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांची भेट, मागण्या शासनाला कळवू, आंदोलन मागे घेण्याचे आवाहन, लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही अशी आंदोलकांची भूमिका, वडवणीत बाजारपेठ बंद, पाटोद्यात दुसऱ्या दिवशीही ठिय्या सुरूच.\nनांदेड - नांदेड - लातूर महामार्गावर दोन बसच्या तसेच अर्धापूर महामार्गावर एका बसची काच फोडली. देगलूर, हिमायतनगर, भोकरमध्ये ठिय्या आंदोलन.\nपरभणी - पाथरीत रास्ता रोको, आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा सहभाग, गंगाखेडमध्ये रात्री सव्वादहाला लातूर-जिंतूर बसवर दगडफेक.\nहिंगोली - जवळाबाजार (ता. औंढा नागनाथ) येथे रास्ता रोकोदरम्यान तीन बस फोडल्या, हिंगोलीत धरणे, सेनगावात ‘बंद’\nलातूर - रेणापूर येथे ‘बंद’, औसा रास्ता रोको.\nजालना - परतूर, मंठा येथे दुसऱ्या दिवशीही धरणे, परतूर शहरात ‘बंद’.\nउस्मानाबाद - कळंब येथे सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे, अज्ञाताकडून बसवर दगडफेक.\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून सहाजण जखमी\nबेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने बंगळूरकडे जाणारी व्हीआरएलची आराम बस उलटून चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय...\nउंड्री - पाचव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजूर ठार\nउंड्री - गुलाम अली नगर गल्ली नं 6 दि.13 ऑगस्ट दु.12.30 वाजता एका निर्माणाधीन इमारतीचे काम सुरू असताना पाचव्या मजल्यावर पडून राजशेखर माशाले (वय 33...\nरावेतला स्वतंत्र पोलिस चौकीची मागणी\nवाल्हेकरवाडी - रावेत परिसराचा विकास झपाट्याने वाढत आहे, त्याचप्रमाणे गुन्हेगारीही वाढत आहे. रावेत परिसरात गुन्हा घडला अथवा काही कारणास्तव पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2018-08-18T09:07:46Z", "digest": "sha1:22L3GOGQEN7KAF4K6NQQ5N2UNTTFZNCK", "length": 5481, "nlines": 60, "source_domain": "m4marathi.com", "title": "वास्तुशास्त्रानुसार हवे घर . | m4marathi", "raw_content": "\nवास्तुशास्त्रानुसार हवे घर .\nआपण घर घेताना सगळय़ात जास्त काळजी घेत असतो कारण घर एक अशी वास्तु आहे की, ते मांगल्याच प्रतीक मानले जाते. माणसांच्या आयुष्यातील सगळय़ात मोठ ध्येय असते की, आपलं एक सुंदर घर असायला हव; पण घर घेताना आपण घर हे खूप पॉश ठिकाणी बघत असतो. पण खूप वेळेला वास्तुशास्त्रानुसार ते घर योग्य आहे का हेच आपण बघत नाही.वास्तुशास्त्रानुसार १00 टक्के घर असणे ही एक कल्पना आहे हे आपल्याकडून कधीच शक्य होत नाही. त्यामुळे आपल्या घरात काही विचित्र गोष्टी घडत असतात; परंतु आपल्याला ते कळून येत नाही की असं का होतंय. वास्तुमध्ये काहीना काही दोष हे राहणारच. ते दोष कमीत कमी राहतील म्हणून वास्तुशास्त्रानुसार रचना करावी. त्यामुळे आपल्या घरात सुख शांती येते. घरामध्ये खालील सहा फोटो नकोत महाभारताच्या युद्धाचे चित्र, ताजमहल, नटराजची मूर्ती, बुडणारे जहाज, फव्वारा, जंगलातील जनावरांचे फोटो इत्यादी चित्र घरात ठेवू नये. असे मानले जाते की, जसे घरात चित्र असतात तसेच वातावरण घरात तयार होत असते.; पण आपल्याला कधी कळून येत नाही.\nवास्तुशास्त्राची रचना करताना अनेक प्राचीन ऋषींनी खूप खोलवर विचार केलेले ग्रंथ लिहिले आहे. म्हणून वास्तुशास्त्रानुसार जर घर बनविले तर घरही सुंदर होते व घरात शांतताही प्रस्थापित होते. बेडरुम, किचन, हॉल, देवघर हे सगळे वास्तुशास्त्रानुसार हवे. गृहिणी स्वयंपाक करताना पूर्व, उत्तर दिशेला हवं. देवघर हे ईशान्याच्या कोपर्‍यात असायला हवे. किंवा पूर्व-पश्‍चिमेला असायला हवे. बेडरुमही नैऋत्यास असायला हवे. प्रवेशद्वार हे उत्तर-पूर्व दिशेला असणे अत्यंत शुभ मानले जाते.\nविकासाला चालना देणारा अर्थसंकल्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/naivedyarti/", "date_download": "2018-08-18T09:13:51Z", "digest": "sha1:EWER7MUDFUEOYMSUICARCUSANBBIO5OE", "length": 5851, "nlines": 149, "source_domain": "www.marathimati.net", "title": "नैवेद्यारती | Naivedyarti", "raw_content": "\nजय देव जय देव जय विठाबाई ॥\nपक्वान्नादी सिद्धी अर्पी तुज ठायीं ॥ ध्रु० ॥\nषड्रसपक्वान्नें हीं अर्पित तुज माईं ॥\nकृपा करूनी तीं तूं मान्य करुनि घेईं ॥\nतृप्ती सर्व जीवां जेवितां तुं आई ॥\nजीवन सर्वांचें हें असे तव पायीं ॥ जय० ॥ १ ॥\nआनंदें भोजन करावें आतां ॥\nयथेच्छ जेउनी उच्छिष्ट उरतां ॥\nतो प्रसाद देईं आपुल्या भक्तां ॥\nहेंचि मागें ठेवुनि तव चरणीं माथा ॥ जय० ॥ २ ॥\nया वर्गातील आणखी काही लेख\nदत्ताची आरती – धन्य हे प्रदक्षिणा\n← सोळा सोमवाराची कहाणी सोमवारची खुलभर दुधाची कहाणी →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/economic-criteria-might-reservation-36948", "date_download": "2018-08-18T08:40:48Z", "digest": "sha1:4MKPV46CVI3NTCB5AKFBQNX5NFNVT5YO", "length": 13319, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Economic criteria might reservation आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे | eSakal", "raw_content": "\nआर्थिक निकषावर आरक्षण मिळावे\nरविवार, 26 मार्च 2017\nकोल्हापूर - जाती-धर्मावर आधारित आरक्षण न देता आर्थिक निकष आणि गरजूंना आरक्षण मिळायला हवे. त्यासाठी सध्याच्या आरक्षण पद्धतीची समीक्षा करण्याची गरज असल्याचा सूर आज आरक्षण पुनर्विचार परिषदेत व्यक्त झाला. लोकमंच संस्थेतर्फे केशवराव भोसले नाट्यगृहात परिषद झाली. परिषदेला विरोध होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता; पण विरोधक परिषदेकडे फिरकलेच नाहीत.\nमूव्हमेंट अगेन्स्ट रिझर्व्हेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शांत प्रकाश जाटव म्हणाले, 'आरक्षणामुळे अपेक्षित असलेला बदल झालाच नाही. एकाच कुटुंबातील तीन-चार पिढ्यांचा विकास झाला. 67 वर्षांनंतरही आरक्षणाची गरज का भासते आरक्षणाचा लाभ सर्वांना होणे अपेक्षित आहे. त्यामुळे आरक्षणाची समीक्षा होणे अपेक्षित आहे. चिंतन, मंथन करून सर्वांच्या हिताचे आरक्षण धोरण स्वीकारण्याची गरज आहे. आरक्षणाची समीक्षा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून तशी मागणी करावी.''\nमधुकर पाटील म्हणाले, 'आरक्षणासंबंधी चिंतन व्हावे, समीक्षा व्हावी, यासाठी परिषद घेतली आहे. शिक्षणामुळे प्रगती झाली. वंचितांना मुख्य प्रवाहात येणे शक्‍य झाले; पण आरक्षण नसल्याने काही समाजांची प्रगती खुंटली आहे. पात्रता असूनही संधी मिळत नसल्याने मराठा समाज आरक्षणाची मागणी होत आहे. मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही, अशी विचारणा होते. त्यांनी स्वतःच्या समाजापेक्षा इतरांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. आता मराठा समाजाच्या अस्तित्वाचाच प्रश्‍न निर्माण झाला. राष्ट्रीय आझाद मंचाच्या राष्ट्रीय सहसचिव स्वागतिका पती म्हणाल्या, 'आरक्षणाचा लाभ सर्वांना व्हावा, यासाठी संघर्ष नव्हे तर समीक्षा करण्याचा हा प्रयत्न आहे. गुणवत्तेला प्राधान्य दिले जात असल्याने अमेरिकेसारखे देश विकसित झाले. चीनने आज भारतीय बाजारपेठेवर अतिक्रमण केले आहे. जागतिकीकरणाच्या स्पर्धेत टिकायचे असेल, तर एकात्मतेचा विचार रुजवण्याची गरज आहे. कोणीही वंचित अथवा दुर्लक्षित राहता कामा नये.''\nराज्यकर्त्यांनी मतांवर डोळा ठेवून आरक्षणाचा खेळखंडोबा केला. लोकांना मुर्ख बनवले. ज्या वेळी लोक मुर्ख होण्याचे थांबतील, तेव्हाच राजकारणी थांबतील.\n- आलोककुमार पांडे, राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय आरक्षणमुक्ती दल.\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nउंड्री - पाचव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजूर ठार\nउंड्री - गुलाम अली नगर गल्ली नं 6 दि.13 ऑगस्ट दु.12.30 वाजता एका निर्माणाधीन इमारतीचे काम सुरू असताना पाचव्या मजल्यावर पडून राजशेखर माशाले (वय 33...\nपिंपळवंडीला मानव-बिबट सहजीवन जनजागृती\nजुन्नर - पिंपळवंडी ता.जुन्नर येथे मानव व बिबट संघर्ष व सहजीवन याविषयी मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती करण्यात आली. जुन्नर वन विभाग तसेच...\nरावेतला स्वतंत्र पोलिस चौकीची मागणी\nवाल्हेकरवाडी - रावेत परिसराचा विकास झपाट्याने वाढत आहे, त्याचप्रमाणे गुन्हेगारीही वाढत आहे. रावेत परिसरात गुन्हा घडला अथवा काही कारणास्तव पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.asm.ac.in/avmmps/", "date_download": "2018-08-18T09:01:25Z", "digest": "sha1:E7BCC6FHFEVOFKAA2NHAKWCN2DWBZ4CZ", "length": 7130, "nlines": 111, "source_domain": "www.asm.ac.in", "title": "Abhinava Vidyalaya Marathi Medium Primary School (AVMMPS) – Adarsha Shikshan Mandali", "raw_content": "\nअभिनव विद्यालय प्रा. (म.मा)\nमा. तात्यासाहेब वीरकर व मा. नानासाहेब उपासनी यांच्या स्मृतीस अभिवादन आदर्श शिक्षण मंडळीचे अध्यक्ष मा. श्री. प्र.चिं. शेजवलकर, संस्थेचे कार्याध्यक्ष व शाला समितीचे अध्यक्ष मा. श्री. वि. ना. चव्हाण, मानद कार्यवाह, श्री. प्रकाश म. जोशीराव व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने शालेय कामकाजाचे व्यवस्थापन केले जाते. शालेय कामकाजाची, विविध उपक्रम, स्पर्धांची माहिती आपणांस व्हावी म्हणून शालेय कामकाजाचा अहवाल सादर करीत आहे.\nसातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनानुसार विविध उपक्रम गटकार्याचा समावेश विद्यार्थी कृतीमध्ये केला आहे व या पद्धतीने अतिशय समाधानकारक मूल्यमापन केले जात आहे\n१५ जून २०१६ रोजी या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. १६ जून २०१६ रोजी सर्व शिक्षा अभियानातर्फेमोफत पाठ्यपुस्तके योजनेनुसार विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप अभिनव विद्यालय पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्या. सौ. विद्याताई साताळकर व निरीक्षक सौ. लता शिराळकर यांच्या हस्ते झाले.\nविशेष उल्लेखनिय यश कामगिरी, स्पर्धा\nसन २०१५-१६ या वर्षी सानेगुरुजी कथामाला समूहगीत स्पर्धेत शाळेने प्रथम क्रमांक मिळवला.\nज्ञानरंजन ग्रंथालया तर्फे इ. ३ री ते ४ थी प्रकट वाचन स्पर्धा घेण्यात आली.\nसानेगुरुजी कथामाला कथाकथन स्पर्धेमध्ये १२६ विद्यार्थ्यांनी भाग घेतला इ. १ ली,२ री मध्ये निषाद महेश साने प्रथम क्रमांक, आनंद मंदार पेंडसे द्वितीय क्रमांक मिळविला. इ. ३ री ते ४ थी मध्ये सानिका जयराम जोशी, प्रथम क्रमांक, गौरांगी ठकसेन कनोजे उत्ते. क्रमांक मिळविला.\nडिसेंबर २०१५ मध्ये झालेल्या शिक्षक नाट्यवाचन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाला. नाटकाचे लेखन मा. निरीक्षक लता शिराळकर यांनी केले. तसेच नाट्यवाचन स्पर्धेत वैशाली नाईक, गीतांजली तांबे, मंगला जोशी, मंगला कटारे व स्वाती वाळके यांनी सहभाग घेतला होता. मंगला जोशी यांना वाचनाचा विशेष पुरस्कार मिळाला. विशेष मार्गदर्शन मा. मुख्या. सौ मीरा लांडगे व मा. निरीक्षक लता शिराळकर यांनी केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2018-08-18T09:07:48Z", "digest": "sha1:WUMGITGADT4GIZAMHZZAJFO3JORFAC4W", "length": 2520, "nlines": 59, "source_domain": "m4marathi.com", "title": "वाट लावली..... | m4marathi", "raw_content": "\n‘मित्राकडे गेलो होतो गं’ उशिरा घरी आलेला दिनू बायकोला कारण सांगतो. खरं-खोटं तपासण्यासाठी बायको त्याच्या १0 मित्रांना फोन करते. पाच जण सांगतात, हो, आलेला ना इथे’ उशिरा घरी आलेला दिनू बायकोला कारण सांगतो. खरं-खोटं तपासण्यासाठी बायको त्याच्या १0 मित्रांना फोन करते. पाच जण सांगतात, हो, आलेला ना इथे तिघे सांगतात, हा काय, आत्ताच गेला.. उरलेले दोघे म्हणतात, अहो वहिनी, हा काय इथेच आहे तिघे सांगतात, हा काय, आत्ताच गेला.. उरलेले दोघे म्हणतात, अहो वहिनी, हा काय इथेच आहे देऊ का त्याच्याकडे फोन\nरजनीकांतचा मुलगा आणि मकरंदचा मुलगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://swarnim-sakhi.blogspot.com/2011/07/blog-post_06.html", "date_download": "2018-08-18T08:17:31Z", "digest": "sha1:AID2S5IKR2EBUYPRTZ5FIIFDA7RPCA5K", "length": 9138, "nlines": 133, "source_domain": "swarnim-sakhi.blogspot.com", "title": "Swarnim Sakhi...: कविता माझी ... !!", "raw_content": "\nअगम्य किंवा सुगम ...कधी मूर्त कि अमूर्त ..\nशब्दातून जे मांडले ...माझ्या मनीचे आवर्त.. \nसंथ जलाशयापरी... नितळ से पारदर्शी ..\nक्वचित विस्कटलेलं ..वादळ गरगरतं..\nजाईजुई फुले कधी.. अल्लद हिंदकळली ..\nवटवृक्षाची सावली.. कधी अपार घनगर्द ..\nझुळझुळता झरा जणू.. उत्फुल्ल खळाळता ..\nअन वैशाख वणवा.. सदा अंतर्यामी तृषार्त..\nगूढ साद अंतर्यामी.. जाणीव का नेणिवेची ..\nशब्द शब्द माझे तरी...... अनुभूती तुमची सार्थ \nगूढ साद अंतर्यामी.. जाणीव का नेणिवेची ..\nही जाणीव/नेणिव ही संपते आणि फक्त अनुभूती उरते. छान कविता केली आहे.\nआता एखादी ट्युशन घावी लागणारे कविता कळण्यासाठी\nगूढ साद अंतर्यामी.. जाणीव का नेणिवेची .. भारी\nधन्यवाद विनायक , मिलिंद अन अभिषेक ... :)\nआता मीच ट्युशन घेते... जरा सोपे सोपे लिहिण्याची :D\n अन इथे सख्य असेल ते जे जे उत्तम उदात्त सुंदर अश्या सारया हृद्य गोष्टींचे .. कविता... लेख... पुस्तक.. फोटो .. रंग ... रेषा... उकार ..वेलांट्या.. जगण्यातल्या चिमुकल्या क्षणांचे .. मनस्वी नात्यांच्या इंद्रधनुषी गोफांचे.. लडीवाळपणे भवती भवती फेर धरणारया आठवणींचे ... अन अंतरी कस्तुरी सारख्या दरवळणारया मैत्रीचे ... किंवा अगदी पायी टोचणारया काट्याचे .. नि पदर ओढत ओरखडे देणाऱ्या निवडुंगाचे सुद्धा .. या सारया गोष्टींचे सख्य आहे.. म्हणून सखी आहे ...\nसांगता येत नाही ...\nरोज की तरह आ गयी वो... रोज की तरह बच्चा देखता रहा अपनी भूरी आँखे भरके... हाथ उठाये ... दिल भरमाये ... रोज की तरह ... फिर एक बार आस लगा...\nपावसात भिजलेले तन मन माझे उगीचच रुसण्याचे बहाणे हे तुझे क्षणार्धात विरतील दुराव्याचे ढग एकदाच परतुनी माझ्याकडे बघ ... ...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ७\nदिवस सातवा हाही दिवस असाच पहाटे उठतो... आधी गणपतीची रूप डोळ्यात रेखून... मग बाकी काम चालू करतो.. सकाळीच पूजा, आरती करून शेजारया...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग 5\nदिवस पाचवा.. हा दिवस गाजवत येतो तयारी हरतालिकेची अन गणपतीची .. सुरु होतो तोच वाजत गाजत .. पुन्हा एकदा वारी बाजाराची... तयारी हरतालिकेच...\nA Walk In Cloud.... गत वर्षीची कोजागिरी अशी जगजीत सिंगजींच्या गझलेत चिंब भिजलेली होती... \"हाथ छुटे भी तो रिश्ते नाही तोडा करते\" ...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ३\nदिवस तिसरा हा दिवस शुभ्र सकाळचा... किलबिल पक्ष्यांच्या आवाजाने जागा होणारा... शेजारच्या गोठ्यातल्या गाईच्या घुंगुरवाळा आवाजाचा... ...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ४\nदिवस चौथा हा दिवस तसा आरामाचा... सुशेगात उठण्याचा... कामाची घाई विसरून चहा पार्टी करण्याचा.. तळ्याच्या काठावर बसून शांत...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ६\nदिवस सहावा... अन मग हा उत्सवी दिवस उजाडतो भल्या पहाटेच... मूर्ती स्थानापन्न होते सजवलेल्या माटीच्या मखरात...मागे रंगवलेले चित्र आत...\nपदर ... नक्षीदार पदर ... रेशमी साडीचा...बुट्टीदार काठाचा .. जरतारीच्या मोराचा वयात येताना आपसूकच चापून-चोपून खांद्यावर विसावलेला... सौभ...\nहृद्य वाचकगण - Followers\nकविता (27) तुमचे सुद्धा होते का असेच (14) सखी (10) मैं (9) भक्ती (3) गोकुळ (2) होकार (2) निळा शाम (1) निळाई (1) भूल (1)\nशेअर विथ केअर :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/?option=com_content&view=section&layout=blog&id=443&Itemid=633&fontstyle=f-smaller", "date_download": "2018-08-18T08:15:49Z", "digest": "sha1:7KOCKY2Y256GTGP3SHEYFWHTIJCE55VP", "length": 7770, "nlines": 32, "source_domain": "saneguruji.net", "title": "महात्मा गांधींचें दर्शन", "raw_content": "शनिवार, आँगस्ट 18, 2018\nआज भाद्रपद वद्य द्वादशी. या तिथीला जी तारीख येते तिच्यापासून आरंभ करून दोन ऑक्टोबरपर्यंत आपण गांधीजयंतीसप्ताह पाळीत असतो. भाद्रपद वद्य द्वादशीस पंचांगाप्रमाणे महात्माजींचा जन्म झाला. इंग्रजी जन्मतारीख २ ऑक्टोबर. जगभर सर्वत्र २ ऑक्टोबरलाच गांधीजयंती होते. भाद्रपद वद्य द्वादशीस आता रेंटिया बारस म्हणजे चरक्याची द्वादशी असे नाव देण्यात आले आहे. कारण महात्माजी म्हणजे रेंटिया. ते एकदा म्हणाले होते, माझा वाढदिवस साजरा करायचा असेल तर खादी खपवा, चरका सर्वत्र न्या. म्हणून त्यांच्या जन्मतिथीलाच रेंटिया बारस नाव देऊन गुजराथने चरका अमर केला. म्हणजेच एक प्रकारे महात्माजींना व त्यांच्या कार्याला अमर केले आहे. असा हा गांधीजयंतीसप्ताह आपण आजपासून सुरू करीत आहोत. या सप्ताहाच्या कार्यक्रमांत गांधीतत्त्वज्ञान किंवा गांधीदर्शन या विषयावर सात दिवस सात प्रवचने देण्याचे मी योजिले आहे. महात्मा गांधी हे आज २५/३० वर्षे आपल्या पुढे सतत उभे आहेत. नाना स्वरूपांत उभे आहेत. महान् क्रान्तिकार्य त्यांनी चालविले आहे. आपणही सारे त्यांच्या या कामामध्ये आपापल्या शक्तीप्रमाणे भाग घेत आहोत. महात्मा गांधींचे चरित्र जगाला नवीन दृष्टिकोण देणारे असल्यामुळे त्याला गांधी-दर्शन किंवा सत्याग्रहदर्शन असे नाव द्यायला हरकत नाही. आज आपल्या देशांत अनेक दर्शने रूढ आहेत. निरनिराळी दर्शने मोठमोठया विभूतींनी या देशाला प्राचीन काळापासून दिली आहेत. परंतु महात्मा गांधींनी आणखी एक नवीन दर्शन दिले आहे; अशा श्रध्देने आपण त्यांच्याकडे बघतो, त्यांच्या कार्यात सामील होतो. महात्मा गांधींच्या चरित्राच्या द्वारा हे नवीन दर्शन, हे नवीन तत्त्वज्ञान जगाला मिळत आहे, या निष्ठेने आपण त्यांचे शक्यतेनुसार अनुकरण करीत आहोत.\nज्या वेळेस एखाद्या पुढा-याच्या विचारांस आपण दर्शन असे नाव देतो, त्या वेळेस ते विचार आपल्या जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे आहेत असे आपण समजत असतो. जीवनाच्या संपूर्ण तत्त्वज्ञानाला आपण दर्शन हे नाव देत असतो. सारे जीवन अंतर्बाह्य कसे आहे व ते कसे असावे याचे अचूक व सम्यक् दर्शन जो महापुरुष घडवितो त्याच्या विचारांना, त्याच्या तत्त्वज्ञानाला आपण दर्शन ही पारिभाषिक संज्ञा देत असतो. अशी दर्शने जगात निरनिराळया वेळी रूढ होत असतात. आजही आहेत. महात्मा गांधींकडे केवळ एक मोठे राजकीय पुढारी एवढयाच दृष्टीने आता आपण पहात नाही. जगही एवढयाच अर्थाने पहात नाही. आज जगांत सर्वतोमुखी ''आम्हांस नवीन जग निर्मावयाचे आहे'' ही भाषा ऐकू येते. ही भाषा राजकारणाहून अधिक व्यापक आहे. एखादी नवीन शासनपध्दतीच फक्त आम्हांस निर्मावयाची आहे असे नाही; एखादे नवीन राष्ट्रच फक्त निर्मावयाचे आहे असे नाही; तर नवीन जग निर्मावयाचे आहे. हे ध्येय आज सर्वांसमोर उभे आहे. हे ध्येय सर्वत्र उच्चारिले जात आहे. सर्व जनतेत नवीन जग निर्माण करण्याची आशा आकांक्षा आज उत्पन्न झाली आहे आणि जनतेत सर्वत्र उत्पन्न झालेली जी ही आशा तिच्या पूर्तीसाठी, हे नवीन जग प्रत्यक्षात यावे. यासाठी आज जगांत अनेक लोक प्रयत्न करीत आहेत. असे प्रयत्न करणा-यांपैकीच महात्मा गांधी हेही एक आहेत.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z80418000851/view", "date_download": "2018-08-18T08:15:34Z", "digest": "sha1:3AD57CPRPXD7O42CULOWW5T3FP3ICLFS", "length": 12495, "nlines": 196, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गीत महाभारत - दुर्योधनाचे पलायन", "raw_content": "\nपितापुत्र अथवा भाउ भाउ एकाच नक्षत्रावर जन्मले असता त्याचे काय परिणाम होतात\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत महाभारत|\nगीत महाभारत - दुर्योधनाचे पलायन\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nशेवटच्या दिवशी रणांगणावर हाहाःकार माजला होता. भीमसेनाने धृतराष्ट्राच्या शेवटच्या सुदर्शन नावाच्या पुत्राला शराच्छादित करुन ठार मारले. धृष्टद्युम्नाने दुर्योधनाच्या सैन्याचा फडशा पाडला. दोन घटकापर्यंत पांडवांकडील रथींनी व विशेषतः अर्जुनाने शत्रूच्या सैन्याची कत्तल चालविली. दुर्योधनाकडील एक हजार राजेही या महायुद्धात आतापर्यंत प्राणास मुकले होते. दुर्योधनाने पाहिले की त्याला सहाय्यक असा वीर कोणी उरलेला नाही. घायाळ झालेला दुर्योधन भकास नजरेने रणांगण पहात होता. पांडवांकडेही दोन हजार रथ व सातशे हत्तीदळ राहिले होते. त्यांच्या विजयघोषणा दुमदुमत होत्या. दुर्योधनाने चारी दिशांकडे नजर टाकली व तो रणातून पळून गेला. पायी चालत असलेला राजा संजयाला दिसला. त्याने दुर्योधनाला तीन महारथी जिवंत असल्याचे सांगितले.दुर्योधनाने संजयापाशी आपले दुःख व्यक्‍त केले. धृतराष्ट्रासाठी निरोपही दिला की तो जलस्तंभन विद्येच्या साह्याने डोहात लपला आहे, तसेच तो अत्यंत घायाळ असून जिवंत आहे.\nवज्रासम भीमाची कोसळे गदा\nनाश बघुनि दुर्योधन खिन्न सर्वथा ॥धृ॥\nभीमाने कुरु वधिले वचन पाळता ॥१॥\nजीवित ना सुहृद कुणी\nकुरुराजा तो जखमी उभा एकटा ॥२॥\nविजयाचा घोष करित वीर नाचता ॥३॥\nमृत अश्वा तो सोडुन\nलपण्यास्तव शोधे तो निकटच्या र्‍हदा ॥४॥\nक्षीणस्वरे सूत वदे कंठ दाटता ॥५॥\nसैन्य नष्ट सर्व रणी\nआनंदित झाला नृप वृत्त ऐकता ॥६॥\nजीवन हे गमे शून्य\nनृप बोले - ’आशा रे खुंटल्या अता ॥७॥\nसांग पित्या तू जाउन\nथकलो मी दुःखभार शिरी वाहता ॥८॥\nराहिन मी ह्या र्‍हदात\nरक्षिन मी प्राण इथे जळी राहता\" ॥९॥\nतेल आणि तूप दिवा एकत्र का लावूं नये\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/congress-shiv-sena-valentines-30700", "date_download": "2018-08-18T08:35:35Z", "digest": "sha1:47KRMGV6IOTGSC234KMDIJQYG33PFJSV", "length": 11506, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Congress-Shiv Sena valentine's कॉंग्रेस-शिवसेनेमध्ये \"व्हॅलेंटाईन'- तावडे | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 15 फेब्रुवारी 2017\nमुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस-शिवसेनेत \"व्हॅलेंटाईन' साजरे झाले असून कॉंग्रेसने सुमारे चाळीस जागांची गिफ्ट शिवसेनेला दिली आहे, अशी टीका भाजपचे मंत्री विनोद तावडे यांनी आज \"व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी केली.\nदादर येथील मुंबई भाजप कार्यालयात तावडे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. ते म्हणाले, की शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीत दहा जागांवर कॉंग्रेसला मदत होईल, असे उमेदवार दिले आहेत, तर कॉंग्रेसने शिवसेनेला चाळीस जागांवर मदत होईल, असे उमेदवार दिले आहेत. काही ठिकाणी या दोन पक्षांनी एकमेकांना मदत होईल, अशी भूमिका घेतली असल्याची टीका तावडे यांनी या वेळी केली.\nमुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस-शिवसेनेत \"व्हॅलेंटाईन' साजरे झाले असून कॉंग्रेसने सुमारे चाळीस जागांची गिफ्ट शिवसेनेला दिली आहे, अशी टीका भाजपचे मंत्री विनोद तावडे यांनी आज \"व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी केली.\nदादर येथील मुंबई भाजप कार्यालयात तावडे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. ते म्हणाले, की शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीत दहा जागांवर कॉंग्रेसला मदत होईल, असे उमेदवार दिले आहेत, तर कॉंग्रेसने शिवसेनेला चाळीस जागांवर मदत होईल, असे उमेदवार दिले आहेत. काही ठिकाणी या दोन पक्षांनी एकमेकांना मदत होईल, अशी भूमिका घेतली असल्याची टीका तावडे यांनी या वेळी केली.\nऔरंगाबाद : 'एमआयएम'च्या नगरसेवकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा\nऔरंगाबाद : महापालिकेत एमआयएम नगरसेकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या पाच नगरसेवकांविरोधात शुक्रवारी (ता.17) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयएम नगरसेवक...\nउंड्री - पाचव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजूर ठार\nउंड्री - गुलाम अली नगर गल्ली नं 6 दि.13 ऑगस्ट दु.12.30 वाजता एका निर्माणाधीन इमारतीचे काम सुरू असताना पाचव्या मजल्यावर पडून राजशेखर माशाले (वय 33...\nवाहून गेलेला तरुण तीस तासांनंतरही सापडेना\nजळगाव ः येथील अयोध्यानगराजवळील नाल्याला काल झालेल्या पावसामुळे पूर आला होता. या पुरात इतर नागरिकांना मदत करणारा तरुण पाय घसरून नाल्यात पडून वाहून...\nताडगाव - मोफत आरोग्य शिबिरात गरिब व आदिवासी नागरीकांनी घेतला लाभ\nपाली - सुधागड तालुक्यातील ताडगाव येथे गुड डुअर्स चैरिटीज मुंबई, टिकेडिके परिसर विकास संघर्ष समिती आणि जय भैरवनाथ युवा मित्र मंडळ ताडगांव यांच्या...\nकारागृह परिसरात बांधकामाची अट उठविली ; अधिसूचना जारी\nसोलापूर : जिल्हा कारागृहाच्या पाचशे मीटर परिसरात बांधकाम न करण्याची अट शासनाने रद्द केली असून, ती शंभर मीटरपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80/word", "date_download": "2018-08-18T08:16:38Z", "digest": "sha1:VPXG3E2QQF5BLOQFRIWN6HKLSYFTGDAP", "length": 6698, "nlines": 77, "source_domain": "www.transliteral.org", "title": "होळीची पोळी - Marathi Dictionary Definition", "raw_content": "\nहल्ली महिला पौरोहित्य करतात हे धर्मसंमत आहे काय\n| Marathi | मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार\nहोळीकरतां नैवेद्य दाखवावयास आणलेली पोळी.\nही पोळी घेण्याचा किंवा प्रथम नैवेद्य दाखविण्याचा एक मान असतो.\nअपमानाची पोळी सर्वांग जाळी आपली पोळी पिकविणें आयत्या तापलेल्या तव्यावर पोळी भाजून घेणें उपाशी मागती भाकर शिळी, देव देतो साखर पोळी एक नळी अन् शंभर पोळी कातड्यासारखी पोळी, पचण्याला महाग झाली घरीं दरिद्र घोळी, बाहेर तूप पोळी ज्‍याची खावी पोळी, त्‍याची वाजवावी टाळी जिकडे पोळी, तिकडे गोंडा घोळी जिकडे पोळी, तिकडे वळी डोक्‍यावर मोळी आणि मागती पोळी तापल्‍या तव्यावर (पोळी-भाकरी) भाजून घेणें दुसर्‍याच्या होळीवर स्वतःची पोळी भाजणारा दिसायला साधी भोळी. काखेंत पुरणाची पोळी परबेक पोळी, घराक माळी पोळी पोळी पडणें बायकोला शिळी पोळी, रांडेला पुरण पोळी भुकेक पोळी नाका, निदेक माचो नाका भक्षण-भात भक्षणा, पोळी दक्षिणा भाकर भाजली, पोळी करपली, कढी बिघडली सैंपाकीण भली भात भक्षणा, पोळी दक्षणा भात भक्षणा, पोळी दक्षिणा लग्नाची पोळी आणि आयुष्याची होळी वाजंत्री-वाजंत्र्याची नळी, पुरणाची पोळी, व स्मशानांतील होळी जगांत सारखी चालू आहे सग्या सोयर्‍यानीं गर्दी केली त्यांच्यासाठीं पुरण पोळी सुळावरची पोळी सासूची जाहली होळी तर सूनबाई म्हणते खाईन पुरणाची पोळी\nसांविधानिक यंत्रणा बंद पडणे\nचंद्र व सूर्य यांच्या ग्रहणी जन्म झाल्यास त्याचे काय परिणाम होतात शांती, विधी काही आहे काय\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/category/33/0/0/geetgopal-yashwant-deo", "date_download": "2018-08-18T08:39:28Z", "digest": "sha1:5LYXLUBX3JMWKD2NHIX3R3N2DUTQTA5E", "length": 13537, "nlines": 166, "source_domain": "www.gadima.com", "title": "GeetGopal (Yashwant Deo) : गीतगोपाल (यशवंत देव्र) : Ga Di Madgulkar (GaDiMa)", "raw_content": "\nलळा-जिव्हाळा शब्दच खोटे,मासा माशा खाई,कुणी कुणाचे नाही राजा,कुणी कुणाचे नाही\nगीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हंटला,तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसताना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकवाला जातांना गळ्यात रुठवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल.\nसुप्रसिद्ध संगीतकार यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेले गीतगोपाल\nनिवेदन: आनंद माडगूळकर,शैला मुकंद,करुणा देव\nनिर्मिती सहकार्य: श्रीकांत कुलकर्णी,राजेंद्र कुलकर्णी\nया विभागात उपलब्ध गाणी : 29 (पान 1)\n२) शरच्श्रंद्रिका मूक हुंकार देते | Sharad Chandrika Muk Hunkaar Dete\nगायक: किशोर कुलकर्णी,अपर्णा संत Singer: Yashwant Deo\n६) पिता पुत्र काजळरात्री | Pita Putra KaajalRaatri\n१२) मायाविनी पूतना | Mayavini Putanaa\n१६) ब्रजवासा सोडुनी | Brajwaasa Soduni\nगीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते तेच छंदासह....\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/january-28-2/", "date_download": "2018-08-18T09:15:31Z", "digest": "sha1:UAB25BYHFZTPINDBS2USGNDC74K3LA2P", "length": 5915, "nlines": 147, "source_domain": "www.marathimati.net", "title": "२८ जानेवारी दिनविशेष | January 28", "raw_content": "\n’पंजाबचा सिंह’ लाला लजपतराय यांचा पंजाबमधील जगराण या गावी जन्म.\n१८८४- स्विस पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ ’पिखार ऑगस्टी’ यांचा जन्म\n१९२५- डॉ. राजा रामण्णांचा जन्म\n१९५६- जगाला प्रदिक्षणा घालणारे पहिले इंग्लिश दर्यावर्दी ड्रेक सर फ़्रान्सिस यांचे निधन\n१९९७- ग्रामोध्दारचे संस्थापक रामचंद्र बाबुरावजी जाधव यांचे निधन\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in दिनविशेष and tagged जन्म, ठळक घटना, दिनविशेष, मृत्यू, २८ जानेवारी on जानेवारी 28, 2011 by प्रशासक.\n← पाऊस अ चा आ, उडवी शत्रुचा धुव्वा →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/marathakrantimorcha-maratha-reservation-agitation-jagannath-sonawane-133594", "date_download": "2018-08-18T08:49:55Z", "digest": "sha1:EVNEHAPPMPOD3HTUFRI2CQNP6RPRU7BJ", "length": 13643, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "#MarathaKrantiMorcha maratha reservation agitation jagannath sonawane #MarathaKrantiMorcha आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यापासून अस्वस्थ, खिन्न | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यापासून अस्वस्थ, खिन्न\nगुरुवार, 26 जुलै 2018\nदेवगाव रंगारी - विष घेऊन आत्महत्या केलेले जगन्नाथ सोनवणे हे मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यापासून कायम अस्वस्थ, खिन्न राहत असत. कुटुंबीय, निकटवर्तीयांशी चर्चा करताना समाजाविषयीची त्यांची तळमळ दिसत असे.\nदेवगाव रंगारी - विष घेऊन आत्महत्या केलेले जगन्नाथ सोनवणे हे मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यापासून कायम अस्वस्थ, खिन्न राहत असत. कुटुंबीय, निकटवर्तीयांशी चर्चा करताना समाजाविषयीची त्यांची तळमळ दिसत असे.\nदेवगाव रंगारी (ता. कन्नड) येथील जगन्नाथ विश्वनाथ सोनवणे हे शिवाजी चौकात राहतात. ते ‘तात्या’ नावाने परिचित होते. त्यांच्या परिवारात पत्नी रुख्मणबाई, भारत व भगवान ही दोन मुले, सुना आहेत. त्यांना सविता ही मुलगी असून, ती विवाहित आहे. घरची दोन एकर कोरडवाहू शेती असल्याने परिस्थिती बेताचीच आहे. शेतीवर परिवाराचा उदरनिर्वाह होत नसल्याने ते बाहेर मोलमजुरी करीत असत. त्यांना शिक्षणाची, वाचनाची आवड होती.\nशिक्षणाचे महत्त्व ते जाणून होते. त्यामुळेच त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही मोठा मुलगा भारत यांना डी.फार्मसी.पर्यंत शिकविले. भारत अभ्यासात हुशार असल्याने ‘एमपीएससी’मार्फत ते तलाठी झाले. लहान मुलगा भगवान हा बाजार समितीत रोजंदारीवर काम करतो.\nजगन्नाथ सोनवणे यांना वृत्तपत्र वाचनाची आवड होती. त्यामुळे जगातील घडामोडींची त्यांना माहिती असे. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे आल्यानंतर त्यांची समाजाविषयीची तळमळ ते बोलून दाखवीत असत. आपला मुलगा नोकरीला लागला; परंतु आपल्या समाजाला जर सवलती असत्या तर इतर मुलेही उच्चशिक्षण घेऊ शकली असती. तीही नोकरीला लागली असती.\nनातेवाइकांची, समाजाची मुले हुशार आहेत; परंतु भरमसाट शुल्क भरण्यासाठी पैसे नसल्याने शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना कसरत करावी लागत असल्याचे पाहून त्यांचे मन खिन्न होत असे. याविषयी ते नेहमी नातेवाइकांसोबत चर्चा करीत असत. सरकार आरक्षण देत नाही. पाऊस नसल्याने शेती करता येत नाही. त्यामुळे मुलांचे शिक्षण कसे पूर्ण करावे, याबाबत चिंता व्यक्त करीत असत. याचदरम्यान आरक्षणाचा लढा सुरू झाला. आंदोलने सुरू झाली. यातच समाजातील युवकांना न्याय मिळावा, या उद्देशाने त्यांनी ‘रास्ता रोको’च्या दिवशी शेतात जाऊन विषारी औषध घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.\nमुंबई मराठा क्रांती मोर्चा\nसंग्रामपूर : वाण धरण ६५ टक्के भरले\nसंग्रामपूर : सातपुडा पर्वतामधील तीन जिल्ह्यांसाठी जलसंजीवनी ठरलेले वाण धरण 65 टक्के भरले आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या ...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nघरकामगार, बांधकाम मजूर महिलांची उपेक्षाच\nजळगाव : दिवसरात्र काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, पण डोक्‍यावर हक्काचं छत नाही...सतत कष्ट करूनही पदरी काहीच न पडल्यामुळे अनेकदा उपवास...\nगिरणा धरण झाले 31 टक्के\nचाळीसगाव : हरणबारी धरणापाठोपाठ गुरुवारी (16 ऑगस्ट) केळझर धरण \"ओव्हर फ्लो' झाले. चणकापूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे त्यातूनही मोठ्या प्रमाणावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-pistol-and-cartridges-seized-119129", "date_download": "2018-08-18T08:49:43Z", "digest": "sha1:EZDFGWVI242UDCRJIRJOO2Q5XNYDQJ76", "length": 15701, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Pistol and Cartridges seized दोन गावठी पिस्तुलांसह काडतुसे जप्त | eSakal", "raw_content": "\nदोन गावठी पिस्तुलांसह काडतुसे जप्त\nशुक्रवार, 25 मे 2018\nकोल्हापूर - जरगनगरातील प्रतीक पोवारच्या खून प्रकरणातील संशयित प्रतीक सरनाईककडून आणखी दोन गावठी पिस्तुलांसह सहा जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली. कंदलगाव परिसरातील खड्ड्यात त्याने ती लपवून ठेवली होती. पुण्यात नोकरी करताना त्याने ही शस्त्रे वाराणसीतून खरेदी केल्याचे तपासात पुढे आले आहे.\nकोल्हापूर - जरगनगरातील प्रतीक पोवारच्या खून प्रकरणातील संशयित प्रतीक सरनाईककडून आणखी दोन गावठी पिस्तुलांसह सहा जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली. कंदलगाव परिसरातील खड्ड्यात त्याने ती लपवून ठेवली होती. पुण्यात नोकरी करताना त्याने ही शस्त्रे वाराणसीतून खरेदी केल्याचे तपासात पुढे आले आहे. चार वर्षांपूर्वी झालेल्या मारहाणीचा राग मनात ठेवूनच त्याने हे कृत्य केल्याची माहिती करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनी पत्रकारांना दिली.\nप्रतीक ऊर्फ चिंटू पोवारच्या डोक्‍यात गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणी प्रतीक सरनाईकला पोलिसांनी अटक केली. यापूर्वी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूलही जप्त केले. काल त्याला घटनास्थळी फिरवले होते. चौकशीदरम्यान काल करवीर पोलिसांना त्याने आपल्याकडे आणखी दोन गावठी पिस्तुले आणि सहा काडतुसे आहेत, ती पाचगाव ते कंदलगाव रस्त्यावरील ओढ्याच्या पुलाखाली खड्डा खोदून त्यात लपवून ठेवल्याचे पोलिसांना सांगितले. काल रात्री उशिरा पोलिस तेथे घेऊन गेले. त्याने पिस्तूल लपवलेले ठिकाण दाखवले. तेथून पोलिस कर्मचारी प्रशांत माने, प्रथमेश पाटील, सागर कांडगावे, युक्ती ठोंबरे, सुमित पाटील आदींनी एका प्लास्टिक पिशवीत ठेवलेली दोन गावठी पिस्तुले आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केली.\nपाचगाव येथील एका मंडळात प्रतीक पोवार, रणजित गवळीसह प्रतीक सरनाईक सक्रिय होते. चार वर्षांपूर्वी नवरात्रोत्सवात प्रतीक पोवारसह इतरांनी प्रतीक सरनाईकला मारहाण केली. त्या अपमानाचा बदला त्याला घ्यायचा होता. मारहाणीनंतर तो पुण्याला गेला. तेथे एका रबर कारखान्यात तो चालक म्हणून काम करू लागला. तेथे मित्राच्या मदतीने त्याने वाराणसीतून एक लाख रुपयांना चार पिस्तुले आणि काडतुसे खरेदी केली. ती घेऊन तो कोल्हापूरला आला.\nइचलकरंजीत केला हवेत गोळीबार\nखरेदी केलेले पिस्तूल घेऊन सरनाईक २०१६ ला इचलकरंजीत गेला. तेथे त्याने हवेत गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रयत्नही केला. त्यावेळी त्या पिस्तुलाची स्प्रिंग तुटली. त्यामुळे ती त्याने दुरुस्तीस टाकली. ती इचलकरंजी पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हाही दाखल झाल्याचे जाधव यांनी सांगितले.\nपाचगाव ते कंदलगाव रस्त्यावर जेथे दोन गावठी पिस्तुले पोलिसांनी जप्त केली, तो भाग सरनाईकचा दारू पिण्याचा नेहमीचा अड्डा होता. खून केल्यानंतर तो तेथेच अंधारात लपून बसला होता.\nवाराणसीतून चार पिस्तुले आणि काडतुसे सरनाईकने खरेदी केली होती. पंधरा हजार रुपये पगार असताना एक लाख रुपये कोठून आणले, तो छुप्या पद्धतीने पिस्तूल विक्री करत होता का, या दिशेनेही पोलिस तपास करत आहेत.\nखून केल्यानंतर सरनाईक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी फिरला. मित्राकडून त्याने कपडे मागवून घेतले. ते कपडे त्याने शिवाजी विद्यापीठात बदलल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून सहाजण जखमी\nबेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने बंगळूरकडे जाणारी व्हीआरएलची आराम बस उलटून चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय...\nउंड्री - पाचव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजूर ठार\nउंड्री - गुलाम अली नगर गल्ली नं 6 दि.13 ऑगस्ट दु.12.30 वाजता एका निर्माणाधीन इमारतीचे काम सुरू असताना पाचव्या मजल्यावर पडून राजशेखर माशाले (वय 33...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/author/ashishdikshit/", "date_download": "2018-08-18T09:17:43Z", "digest": "sha1:QEPEXU7QJXXDUIWTVXUKAJM4DNJIMKPK", "length": 10296, "nlines": 132, "source_domain": "www.marathimati.net", "title": "आशिष दिक्षीत | मराठीमाती", "raw_content": "\nआई मराठीची शिक्षिका असल्यामुळे आणि वर्गातल्या मुलांचं शुद्धलेखन तपासण्याची जबाबदारी शाळेत पार पाडल्यामुळे ‘शुद्धलेखन’ हा एकूणच माझ्या जिव्हाळ्याचा विषय होता. पुढे संस्कृत शिकल्यावर तर संस्कृतधार्जिण्या मराठी शुद्धलेखनावर मी अधिकारवणीनं बोलू लागलो. कुणी ‘शारीरिक’ऐवजी ‘शारिरीक’ लिहिलं, तर माझा सात्विक संताप व्हायचा. ‘अशुद्ध’ पाट्या लावणाऱ्या अनेक दुकानदारांना भेटून मी पाट्या दुरुस्त करण्याची विनंती करायचो. इंग्रज स्पेलिंग्सबाबत तडजोड करत नाहीत, तर आपण शुद्धलेखनाच्या बाबतीत का करावी, असा सणसणीत सवाल हाणून मी बापड्या ‘अशुद्धां’ना चुप करायचो\nपण आता विचाराअंती माझी मतं दुसऱ्या टोकाला पोहोचली आहेत. शुद्धलेखन हा प्रकारच मराठीतून हद्दपार व्हायला हवा, अशी माझी इच्छा आहे. त्याला दोन मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे शुद्धलेखनाच्या नियमांमधला फोलपणा माझ्या लक्षात आलाय. मराठीत उच्चारांप्रमाणेच शुद्धलेखन आहे, हे मला पूर्णतः मंजूर नाही. मग उच्चारांप्रमाणे नसलेल्या निरुपयोगी गोष्टी लक्षात ठेवून पुन्हा पुन्हा का लिहायच्या त्यात शुद्धलेखनाचे नियम भयंकर संस्कृतधार्जिणे आहेत. मूळ प्राकृत शब्दांच्या तुलनेत संस्कृतातून आलेल्या शब्दांना विनाकारण जास्त महत्त्व देण्यात आलंय.\nदुसरं कारण म्हणजे मराठी शुद्धलेखनाचे नियम अतिशय गुंतागुंतीच, प्रसंगी अतार्किक आहेत. सर्वसामान्य माणसाने हे सगळं लक्षात ठेवावं, ही अपेक्षाच मूर्खपणाची आहे मग त्याने आपलं म्हणणं मांडण्यासाठी लिहायची हिंमत केलीच, तर त्याच्या ‘अशुद्ध’लेखनाची थट्टा उडवायची, हे अन्यायकारक आहे. इंग्रजीचा वाढता प्रसार, त्यामुळे मराठीचा कमी होत चाललेला वापर, त्यात रोमन लिपीतून मराठी लिहिण्याकडे असलेला तरुणांचा सोयिस्कर कल, अशा सर्व गोष्टींचा विचार करता, देवनागरी मराठीचा लोकांनी जास्तीत जास्त वापर करावा, यासाठी त्यांना प्रवृत्त करणं गरजेचं आहे. किमान, ते परावृत्त होणार नाहीत, याची तरी खबरदारी घेतली गेली पाहिजे.\nयावर उपाय एकच. ‘र्‍हस्व’ आणि ‘दीर्घ’ या दोघांची हकालपट्टी करणे तुमचा विश्वास बसणार नाही, पण मराठी आधी ज्या मोडी लिपीत लिहिली जायची, त्यात ही भानगडच नव्हती तुमचा विश्वास बसणार नाही, पण मराठी आधी ज्या मोडी लिपीत लिहिली जायची, त्यात ही भानगडच नव्हती फक्त एक इकार आणि एक उकार फक्त एक इकार आणि एक उकार पण मोडी मोडीत काढून आपण संस्कृतची देवनागरी लिपी स्वीकारली आणि त्यासोबत र्‍हस्व-दीर्घचं लंटाबरही ओढावून घेतलं पण मोडी मोडीत काढून आपण संस्कृतची देवनागरी लिपी स्वीकारली आणि त्यासोबत र्‍हस्व-दीर्घचं लंटाबरही ओढावून घेतलं जर आता आपण ही भानगड निकालात काढली, फक्त पहिला इकार आणि पहिला उकार राहील. सुरुवातीला थोडं विचित्र वाटेल, पण नंतर आपल्याला सवय होइल. आनंदाची गोष्ट म्हणजे कुणि काहिहि अशुद्ध लिहिणार नाहि. तुम्हि लिहाल, ते सारं शुद्धच असेल\nThis entry was posted in ब्लॉग and tagged आई, आशिष दिक्षीत, दीर्घ, मराठी, र्‍हस्व, शुद्धलेखन on नोव्हेंबर 9, 2012 by आशिष दिक्षीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AB%E0%A5%AA", "date_download": "2018-08-18T08:58:02Z", "digest": "sha1:YU66GOUERCERA76GYCXIQY3LWKFPB4HP", "length": 6763, "nlines": 210, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९५४ - विकिपीडिया", "raw_content": "\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९५४ मधील खेळ‎ (४ प)\n► इ.स. १९५४ मधील जन्म‎ (१ क, ८८ प)\n► इ.स. १९५४ मधील मृत्यू‎ (१४ प)\n► इ.स. १९५४ मधील चित्रपट‎ (२ क, १ प)\n\"इ.स. १९५४\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१३ रोजी १९:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-st-workers-strike-akkalkot-77684", "date_download": "2018-08-18T08:30:48Z", "digest": "sha1:LR7SWEDM6SF4FJF2UUEQPTDV3GUT3HVW", "length": 13640, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Solapur news ST workers strike in Akkalkot अक्कलकोट येथे एसटी संपाने प्रवाशांचे हाल; ४०३ कर्मचारी संपावर | eSakal", "raw_content": "\nअक्कलकोट येथे एसटी संपाने प्रवाशांचे हाल; ४०३ कर्मचारी संपावर\nमंगळवार, 17 ऑक्टोबर 2017\nआज अक्कलकोट आगारातील सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन संपाबाबत प्रबोधन करण्यात आले आहे.संपावर जाऊन ऐन दिवाळीत गैरसोय होऊन\nप्रवाशांना अडचणीत न धरता कामावर हजर व्हावे असे आवाहन केले होते पण त्यांनी प्रतिसाद न देता संपावर गेले आहेत. त्यामुळे महामंडळाचे आर्थिक नुकसान व प्रवाश्यांची गैरसोय होत आहे.\n- विवेक हिप्पळगांवकर, आगार प्रमुख अक्कलकोट\nअक्कलकोट : अक्कलकोट आगारातील एकूण वाहक, चालक, कंट्रोलर आणि तांत्रिक विभागातील असे ४०३ कर्मचारी सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेलेले आहेत. त्यामुळे अक्कलकोट एसटी स्थानकात संप माहित नसलेले प्रवाशी येत असून त्यांना या ठिकाणी आल्यावर याबाबत माहिती मिळाल्याने त्यांची मोठी गैरसोय व गावाला जाण्यासाठी धावपळ होताना दिसत आहे.\nप्रवाशांना ऐन सणासुदीच्या दिवसात मनस्ताप सहन करावा लागणार आहे. महाराष्ट्रातील सर्व शाळा महाविद्यालयांना सध्या सुट्या आहेत. इतरांनाही सुट्ट्या आहेत त्यामुळे समर्थांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार आहे. ऐन दिवाळी सणात कर्मचाऱ्यांनी उपसलेल्या संपाच्या हत्याराबाबत प्रवाशांत मात्र नाराजीची भावना दिसत आहे. दिवाळीत महामंडळाच्या उत्पन्नात मोठी घट यामुळे होणार आहे. मग त्यांना पगारवाढ महामंडळ नुकसान झाल्यानंतर कुठून देणार ही भावना व्यक्त करीत आहेत. अक्कलकोट आगारातील १५२ चालक, १८६ वाहक, १८ वाहतूक नियंत्रक आणि तांत्रिक कर्मचारी असे ४०३ कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतन वाढीच्या दर चार वर्षांनी होणाऱ्या करार वेतन वाढीसाठी आणि इतर न्याय मागण्यासाठी संपावर जात असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटनाचे अध्यक्ष बाबुराव फुलारी आणि इंटकचे अध्यक्ष राहुल स्वामी यांनी सकाळशी बोलताना सांगितले.\n१ एप्रिल २०१६ पासून सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय एस.टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगातील मिळणाऱ्या वेतनश्रेणी, वेतन,विविध भत्ते व सेवा सवलती लागू करण्यात याव्यात यासाठी हा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. आता सणासुदीच्या दिवसात प्रवास कसा करायचा याची अडचण नागरिकांसमोर असणार आहे.\nआज अक्कलकोट आगारातील सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन संपाबाबत प्रबोधन करण्यात आले आहे.संपावर जाऊन ऐन दिवाळीत गैरसोय होऊन\nप्रवाशांना अडचणीत न धरता कामावर हजर व्हावे असे आवाहन केले होते पण त्यांनी प्रतिसाद न देता संपावर गेले आहेत. त्यामुळे महामंडळाचे आर्थिक नुकसान व प्रवाश्यांची गैरसोय होत आहे.\n- विवेक हिप्पळगांवकर, आगार प्रमुख अक्कलकोट\nसमस्या सोडवण्यासाठी नाशिकला भरणार शिक्षकांचा दरबार\nयेवला - शिक्षकांच्या विविध रखडलेल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी नाशिकमध्ये विभागातील शिक्षकांचा शिक्षक दरबार गुरुवारी (ता.२३) आयोजित करण्यात आला...\nबापजी गेले. आज पुन्हा एकदा माझ्या डोक्‍यावरचे वडिलांचे छत्र हरपले. निव्वळ अवर्णनीय दु:खाचा दुसरा आघात आज माझ्यावर झाला आहे. मन एका क्षणात...\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nगुरुजींच्या खात्यावर पेन्शन जमा\nकोरेगाव - सातारा जिल्ह्यातील १२ हजारांवर सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे जुलै महिन्याचे सेवानिवृत्ती वेतन अखेर मंगळवारी (ता. १४) तालुका पातळीवर...\nविशेष शिक्षकांची वेतन कपात\nकापडणे (जि.धुळे) - दिव्यांगांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी 2006 मध्ये नियुक्त केलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/407/Aandhalyala-Paisa-De-Data.php", "date_download": "2018-08-18T08:35:08Z", "digest": "sha1:QY3VCULJWUJNFZIQW327RPREJAE6MJOG", "length": 9944, "nlines": 140, "source_domain": "www.gadima.com", "title": "Aandhalyala Paisa De Data -: आंधळ्याला पैसा दे दाता : ChitrapatGeete-Popular (Ga.Di.Madgulkar|Sudhir Phadke|Sudhir Phadke) | Marathi Song", "raw_content": "\nदोन ओंडक्यांची होते सागरांत भेट\nएक लाट तोडी दोघां, पुन्हा नाही गांठ\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nआंधळ्याला पैसा दे दाता\nचित्रपट: झेप Film: Zeph\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nया गीताचे शब्द लवकरच उपलब्ध होत आहेत,कृपया या पानाला पुन्हा भेट द्या,\nतोपर्यंत आपण हे गाणे ध्वनिरुपात ऐकू शकता.\nआदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.\nआसावल्या मनाला माझाच राग येतो\nआयलय बंदरा चांदाचे झाज\nअरे अरे नंदाच्या पोरा\nबदलती नभाचे रंग कसे (आनंदी)\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/hand-blender/cheap-savvy+hand-blender-price-list.html", "date_download": "2018-08-18T08:09:58Z", "digest": "sha1:XFCIOP64ZFRVMQ2V5ESJ5NEDVCDZ5KAN", "length": 14972, "nlines": 408, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये साव्व्य हॅन्ड ब्लेंडर | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap साव्व्य हॅन्ड ब्लेंडर Indiaकिंमत\nस्वस्त साव्व्य हॅन्ड ब्लेंडर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त हॅन्ड ब्लेंडर India मध्ये Rs.1,530 येथे सुरू म्हणून 18 Aug 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. साव्व्य हब 36 350 W हॅन्ड ब्लेंडर Rs. 2,700 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये साव्व्य हॅन्ड ब्लेंडर आहे.\nकिंमत श्रेणी साव्व्य हॅन्ड ब्लेंडर < / strong>\n0 साव्व्य हॅन्ड ब्लेंडर रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 675. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,530 येथे आपल्याला साव्व्य हब 45 350 W हॅन्ड ब्लेंडर उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nशीर्ष 10साव्व्य हॅन्ड ब्लेंडर\nसाव्व्य हब 45 350 W हॅन्ड ब्लेंडर\nसाव्व्य हॅन्ड ब्लेंडर H&B 36 हॅन्ड ब्लेंडर्स ब्लॅक\nसाव्व्य हब 36 350 W हॅन्ड ब्लेंडर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/26/189/Aaj-Sugandhit-Zale-Jeevan.php", "date_download": "2018-08-18T08:37:00Z", "digest": "sha1:AQHFWXMQVGQYIGQJTRT7MJDSLGSXNAUI", "length": 8052, "nlines": 144, "source_domain": "www.gadima.com", "title": "Aaj Sugandhit Zale Jeevan | आज सुगंधित झाले जीवन | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nअंत उन्नतीचा पतनीं होइ या जगांत\nसर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत\nगदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics\nआज सुगंधित झाले जीवन\nआज सुगंधित झाले जीवन\nवसंत फुलले तव स्पर्शांतून\nफुले सुगंधित, लता सुगंधित\nसौख्य सुगंधित, व्यथा सुगंधित\nगगन सुगंधित, मेघ सुगंधित\nस्थैर्य सुगंधित, वेग सुगंधित\nमम भाग्याची रेघ सुगंधित\nहार सुगंधित, जीत सुगंधित\nउष्ण सुगंधित, शीत सुगंधित\nप्रीत सुगंधित, गीत सुगंधित\nसुगंध गळतो या नयनांतुन\nमाडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nअंगणी गंगा घरात काशी\nअसा कुणी मज भेटावा\nआई मला नेसव शालू नवा\nआईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही\nआचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.blogspot.com/2017/07/", "date_download": "2018-08-18T09:14:08Z", "digest": "sha1:JJSAE77GLNHTRO3LA3XHT7NFAUVB5YKK", "length": 64425, "nlines": 292, "source_domain": "aisiakshare.blogspot.com", "title": "ऐसी अक्षरे: July 2017", "raw_content": "\nचोहीकडे जयघोष झाला बहोत खूब अन् वाहवा मैफलीत या रंग भरण्या 'मंदार' हा आला पहा...\nबालशिक्षण की शालेय शिक्षणाची पूर्वतयारी\nयुनिसेफ आणि 'असर'तर्फे भारतातल्या बालशिक्षणाच्या परिणामांचा अभ्यास - दी इंडीया अर्ली चाइल्डहूड एज्युकेशन इम्पॅक्ट स्टडी (आयईसीईआय) - करण्यात आला. यामधे, आसाम, राजस्थान, तेलंगणा राज्यातल्या ग्रामीण भागांतून १४,००० मुलांचं त्यांच्या वयाच्या ४ ते ८ वर्षांपर्यंत निरीक्षण करण्यात आलं.\nअहवालात नोंदवलेली निरीक्षणं :\n१. ग्रामीण भागात ७०% मुलं वयाच्या चौथ्या वर्षी अंगणवाडी / बालवाडी / खाजगी पूर्वप्राथमिक शाळांमधे दाखल झालेली दिसतात.\n२. वयानुसार आखून दिलेला अभ्यासक्रम आणि मुलांची प्रत्यक्ष शिकण्याची क्षमता/प्रगती यांमधे तफावत दिसून येते. उदाहरणार्थ, काही ठिकाणी चार वर्षांची मुलं प्राथमिक शाळेत बसून पहिलीचा अभ्यासक्रम शिकतायत, तर सहा-सात वर्षांच्या मुलांवर पूर्वप्राथमिकमधे काम सुरु आहे. आपण समजतो तसा, वय आणि इयत्तांचा फारसा परस्परसंबंध प्रत्यक्षात दिसून येत नाही.\n३. प्राथमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमानुसार, पाच-सहा वर्षांच्या मुलाची भाषिक आणि सांख्यिक अनुभूती जेवढी अपेक्षित आहे, तेवढी सध्याच्या पूर्वप्राथमिक अभ्यासक्रमातून साध्य होत नाही. शाळेत गेल्यावर पहिल्या इयत्तेपासून पुढं ही दरी आणखी रुंदावत जाते.\n(मुलं प्राथमिक शिक्षण सुरु करण्यासाठी तयार आहेत का हे तपासण्यासाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नांमधे, चार झाडांची चित्रं दाखवून सर्वांत जास्त/कमी फळं लागलेलं झाड ओळखणं, नळातून बादलीत पाणी भरताना चार चित्रं दाखवून रिकामी ते भरलेली बादली असा क्रम लावणं, वस्तूंची संख्या आणि अंक यांची जोडी लावणं, यांचा समावेश होता.)\n४. शासकीय अंगणवाड्या आणि खाजगी पूर्वप्राथमिक शाळा या दोन्हींमधे मुलांच्या वयानुरुप विकासासाठी आवश्यक वातावरणाचा आणि साधनांचा अभाव दिसतो. अंगणवाडीचा भर पोषक आहार आणि लहान मुलांसाठी पाळणाघर चालवण्यावर दिसतो. खाजगी पूर्वप्राथमिक शाळा प्राथमिक शाळांचा जोड-उपक्रम म्हणून चालवल्या जातात, ज्यामधे वाचन-लेखन-गणित या औपचारिक शिक्षणावर जास्त भर दिलेला दिसतो.\nवरील निरीक्षणांवरुन अहवालात केलेल्या धोरणात्मक सूचना :\n१. सर्व मुलांना ठोस पायाभूत शिक्षण उपलब्ध होण्यासाठी पूर्वप्राथमिक/बालशिक्षणाला शिक्षण हक्क कायद्यात समाविष्ट करुन घेणं. (सध्या ६ ते १४ वयोगटातल्या मुलांना, म्हणजे पहिलीच्या पुढं शिक्षण हक्क कायदा लागू होतो.)\n२. प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमासाठी पूर्वतयारी झाल्यावरच मुलांना प्राथमिक शाळेत प्रवेश देणं. (काही ठिकाणी सहा वर्षांखालील मुलांना पहिलीत प्रवेश दिलेला आढळला, त्यावरुन ही सूचना आलेली दिसते. मुलांवर प्राथमिक शिक्षणाचा ताण पडू नये असा हेतू यामागं आहे.)\n३. प्राथमिक शिक्षणासाठी आवश्यक क्षमता मुलांमधे विकसित व्हाव्यात म्हणून सध्या वय वर्षे 'पाच ते तीन' अशा वयोगटासाठी अभ्यासक्रम ठरवला जातो. त्याऐवजी, जास्तीत जास्त खेळावर आधारीत, संधी आणि अनुभवातून शिकता येईल असा, 'तीन ते पाच' वयोगटासाठी अभ्यासक्रम तयार करणं. त्यादृष्टीनं शिक्षक प्रशिक्षणात बदल करणं. (मुलांना योग्य वयात योग्य शिक्षण मिळावं हा उद्देश आहे. पुढच्या इयत्तांसाठी त्यांना तयार करणं हाच उद्देश असेल तर वयानुरुप शिक्षण शक्य होत नाही.)\n४. मुलांच्या जडणघडणीच्या महत्त्वाच्या वर्षांमधे त्यांना दिलं जाणारं शिक्षण आणि वातावरण यांच्या नियमनासाठी कार्यक्षम यंत्रणा / मानांकन पद्धत निश्चित करणं. अंगणवाडी, खाजगी पूर्वप्राथमिक शाळा, स्वयंसेवी संस्थांचे अनौपचारिक वर्ग या सर्वांसोबत या यंत्रणेनं काम करणं आवश्यक.\n५. मुलांच्या योग्य विकासासाठी बाल शिक्षण अभ्यासक्रम / पद्धत याबद्दल शिक्षक, पालक, आणि इतर घटकांशी संवाद साधून जागृती करणं. पूर्वप्राथमिक शिक्षणात सोप्या पद्धती व साधनांवर भर देऊन पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणं.\nबाल शिक्षण आणि संगोपनाचा आदर्श नमुनाः\n२. प्रत्येक मुलाकडं वैयक्तिक लक्ष.\n३. मुलांना प्रश्न पडावेत व त्यांनी प्रश्न विचारावेत यासाठी पूरक वातावरण.\n४. नियमित दैनंदिन नियोजनबद्ध अभ्यासक्रम.\n५. व्यक्तिगत व सामूहीक खेळ आधारीत उपक्रम.\n६. मुक्त खेळ आणि मार्गदर्शनाखालील खेळ यांवर आधारीत उपक्रम.\n७. भाषा आणि गणिताच्या संकल्पनांची पायाभरणी.\n८. प्राथमिक शाळा/शिक्षण यांच्यासाठी तयारी करुन घेणं.\n९. वाचन, लेखन, गणितीय क्रिया औपचारिकपणे शिकवण्यास मनाई.\nसहा वर्षांच्या मुलांची शालेय शिक्षण सुरु करण्यासाठी तयारी म्हणजेः\n१. शाळेच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वैयक्तिक/सामूहीक तयारी.\n२. भाषा आणि गणिताचे विषय शिकण्यासाठी पुरेशी समज.\nमूल दोन-अडीच वर्षांचं झालं की एखादी ब्रॅन्डेड नर्सरी/प्लेग्रुप शोधून त्याला अडकवून टाकणं, याच्या पलीकडं जाऊन सर्व पालकांनी विचार करणं गरजेचं आहे. ('केजी टू पीजी' अशी सोय असेल तर पालकांना मूल काय शिकतंय यावर अजिबातच विचार करावा लागत नाही.)\nवयाच्या पाचव्या वर्षापर्यंत मुलाच्या मेंदूचा खरा विकास होत असतो. त्या वयात मुलाला आपण (आई-वडील, शिक्षक, समाज) काय देतोय, हे एकदा प्रत्येकानं स्वतःपुरतं तरी तपासून बघावं, असं मला वाटतं. युनिसेफच्या या रिपोर्टचा निष्कर्षही असाच काहीतरी आहे.\nबालशिक्षण की शालेय शिक्षणाची पूर्वतयारी\nLabels: मराठी, लेख, शिक्षण\nराष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) यांच्या 'राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५' साठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष प्रा. यश पाल हे होते. सदर आराखड्याच्या प्रस्तावनेत प्रा. यश पाल यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडून त्यांची शिक्षणाविषयी संकल्पना स्पष्ट केली आहे.\nया प्रस्तावनेमधे प्रा. यश पाल म्हणतात की, कोणतीही गोष्ट 'समजून घेण्याची' आपली क्षमता आपण विसरुन गेलो आहोत. त्याऐवजी आपण पाठांतरावर आधारित, अल्प काळ टिकणारं, 'माहिती गोळा करण्याचं कौशल्य' आत्मसात केलं आहे. आणि आता ह्या माहितीच्या साठ्याचा विस्फोट होण्याची परिस्थिती येऊन ठेपलेली असल्यानं आपल्याला पुन्हा उलटा प्रवास करणं गरजेचं झालं आहे.\nप्रा. यश पाल यांच्या मते, या 'समजून घेण्याच्या प्रक्रिये'ची ओळख आपण आपल्या मुलांना करुन दिली पाहिजे, जेणेकरुन ते जगण्याच्या अनुभवांतून स्वतःचं ज्ञान निर्माण करु शकतील. यामुळं आपल्या मुलांची शिकण्याची प्रक्रिया खर्‍या अर्थानं सृजनात्मक आणि आनंददायी होऊ शकेल, परिपूर्ण होऊ शकेल. परीक्षा नावाच्या अडथळ्यांच्या शर्यतीपूर्वी, थोड्या वेळापुरती, जास्तीत जास्त माहिती साठवण्याचा मुलांवर येणारा ताण कमी करण्यासाठी ही 'समजून घेण्याची कला' उपयोगी ठरेल.\nप्रा. यश पाल पुढं असं म्हणतात की, कागदांवर शाईच्या ठिपक्यांच्या रुपात किंवा कॉम्प्युटरच्या डिस्कवर बिट्सच्या रुपात साठवून ठेवण्याची माहिती आपण मुलांच्या आठवणींमधे - स्मृतीमधे कोंबण्याचा प्रयत्न करीत आहोत. अशा प्रकारे माहिती साठवण्यातली व्यर्थता आणि मुलांची शिकण्याची क्षमता आपण समजून घेतली पाहिजे, मान्य केली पाहिजे.\nप्रा. यश पाल यांच्या मते, शिक्षण ही पोस्टानं पाठवायची किंवा शिक्षकांच्या मार्फत मुलांपर्यंत पोचवायची भौतिक वस्तू नाही. मुलांच्या सुपिक मेंदूमधे विविध संकल्पनांची पेरणी करावी लागते आणि पालक, शिक्षक, मित्रमंडळी, समाज यांच्याशी होणार्‍या परस्पर संवादातून हे पीक जोपासावं लागतं. खर्‍याखुर्‍या ज्ञानाच्या निर्मितीप्रक्रियेत मुलांबरोबर शिक्षकसुद्धा शिकत जातो.\nयाही पुढं जाऊन प्रा. यश पाल म्हणतात की, मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांची निरीक्षण करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळं कोणत्याही प्रकारच्या ज्ञानाची निर्मिती करण्यामधे मुलांची भूमिका जास्त महत्त्वाची असते. \"माझ्या मर्यादीत समजेचा बहुतांश भाग मला लहान मुलांशी झालेल्या संवादातून प्राप्त झालेला आहे,\" असं प्रा. यश पाल प्रामाणिकपणे कबूल करतात.\nदूरदर्शनवर 'टर्निंग पॉइंट' कार्यक्रमात अवघड शास्त्रीय संकल्पना सोप्या शब्दांत समजावून सांगणारे प्रा. यश पाल आता आपल्यात नाहीत. पण शिकण्या-शिकवण्याबद्दल, खर्‍या ज्ञानाच्या निर्मितीबद्दल त्यांनी मांडलेले विचार आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करत राहतील.\n- मंदार शंकर शिंदे\nभारतातनं अमेरिकेत नोकरीसाठी खूपजण जातात. त्यांचा तिथला पगार ते डॉलरमधे सांगतात. तो आकडा ऐकून भारतातली माणसं हमखास मनातल्या मनात पटकन साठानं गुणाकार करतात. रुपयांमधे तो आकडा केवढाऽऽ मोठ्ठा वाटतो. मग पुढच्या सगळ्या चर्चा आणि विचार ‘त्या’ मोठ्ठ्या आकड्याभोवतीच पिंगा घालत राहतात.\nप्रत्यक्षात ज्या-त्या चलनाची (डॉलर किंवा युरो किंवा रुपयाची) आपली-आपली एक खरेदीची ताकद असते – पॉवर ऑफ पर्चेसिंग. इथं नुसतं ‘चलनाची ताकद’ म्हणून भागणार नाही. ते चलन कुठं वापरलं जातं, त्यानुसारसुद्धा त्याची ताकद बदलत जाते. उदाहरणार्थ, भारतीय रिझर्व्ह बँकेनं पाचशे रुपयांची नोट छापून चलनात आणली. ह्या पाचशे रुपयांत मी काय-काय खरेदी करु शकतो हे ब-यापैकी मी कुठं राहतो त्यावर अवलंबून असतं. (‘ब-यापैकी’ म्हटलं कारण अलीकडं एमआरपीचा जमाना असल्यानं काही प्रमाणात खर्चिक समानता आलीय हे नाकारता येणार नाही.)\nतर, या पाचशे रुपयांच्या नोटेची किंमत पुण्याच्या बाजारात, मुंबईच्या बाजारात, कोल्हापूरच्या बाजारात, नाशिकच्या बाजारात, गडचिरोलीच्या बाजारात वेगवेगळी असते. म्हणजे कसंय, आपल्या स्वतःच्या गावात आमदाराचा रुबाब वेगळा असतो. पण मुंबईला अधिवेशनासाठी गेलं की त्याच्यापण ड्रायव्हरला पार्कींग शोधत फिरायला लागतं. तिथं आधीच दोनशे सत्त्याऐंशी ‘आमदारां’च्या गाड्या लागलेल्या असतात. म्हणजे, या एका आमदाराची किंमत तिथं एक भागिले दोनशे अठ्ठ्याऐंशी एवढी झाली का आणि परत आपल्या गावात आल्यावर ती शंभर टक्के पूर्ण झाली का आणि परत आपल्या गावात आल्यावर ती शंभर टक्के पूर्ण झाली का विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना\nतर, प्रत्येक गाव/शहरानुसार पैशाच्या बदलणा-या किंमतीला आपण सोप्या भाषेत महागाई म्हणतो. मग मुंबईचं लाईफ कोल्हापूरापेक्षा महाग आहे, असं सहज जाता-जाता म्हटलं जातं. हे महाग-स्वस्त कशावरुन ठरतं छोट्या शहरात दोनशे स्क्वेअर फुटाच्या फ्लॅटचं भाडं दोन-तीन हजार असू शकतं, मोठ्या शहरात तेवढ्याच जागेला आठ-नऊ हजार मोजावे लागू शकतात. गावाकडं पन्नास रुपये खिशात घेऊन सकाळी बाहेर पडलेला माणूस दोन चहा, एक नाष्टा, एक जेवण करुन संध्याकाळी परत येऊ शकतो. मोठ्या शहरात एका नाष्ट्यालासुद्धा तेवढे पैसे पुरतील का याचीच शंका असते. म्हणजे पन्नास रुपयांची नोट तीच, फक्त जागा बदलल्यानं तिची ‘पॉवर ऑफ पर्चेसिंग’ कमी झाली.\nआता याच मुद्द्याला धरुन दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो – गाव की शहर गाव किंवा छोट्या शहरात जन्मलेल्या आणि थोडंफार शिक्षण मिळू लागलेल्या प्रत्येकाला मोठ्या शहराची स्वप्नं पडतात. शहरात गेला म्हणजे प्रगती झाली असं एक दृश्य परिमाण आपोआप तयार झालेलं आहे. आपल्याच गावात राहून लाखो रुपये कमावले तरी लोक म्हणणार, “पोरगं हुशार होतं, पण गावातच कुजलं… शहरात गेलं असतं तर कोटीत कमावलं असतं.” आणि शहरात जाऊन कर्जबाजारी झालेल्या माणसाची मात्र झाकली मूठ सव्वा कोटीची राहणार.\nम्हणजे आयुष्यभर कुणी आपलं गाव सोडून दुस-या गावात/शहरात जाऊच नये की काय जरुर जावं, पण त्यामागचं कारण काय हेपण प्रामाणिकपणे समजून घ्यावं. उदाहरणार्थ, मागच्या पिढीपर्यंत – म्हणजे १९८०-९० सालापर्यंत - आपलं गाव सोडून बाहेर पडण्याची कारणं काय होती\n१. आमच्या गावात चांगलं शिक्षण मिळत नाही;\n२. आमच्या गावात पुरेशा नोक-या मिळत नाहीत;\n३. आमच्या गावात कुठलाच धंदा चालत नाही;\n४. आमच्या गावात वीज/पाणी/रस्ते अशा मुलभूत सुविधा नाहीत;\n५. जगातलं नवनवीन तंत्रज्ञान, सोयी-सुविधा आमच्या गावात पोचलेल्या नाहीत;\n६. माझ्या शिक्षणानुसार किंवा कामाच्या आवडीनुसार गावात कामाच्या संधी नाहीत;\n७. मला या गावात/शहरात राहण्याची इच्छा नाही किंवा तत्सम व्यक्तिगत कारणं.\nया कारणांपैकी किती कारणं आजसुद्धा लागू होतात याचा विचार खरंच आपण करतोय का\n१. गावोगावी उभ्या राहिलेल्या शिक्षण संस्था, शाळा-कॉलेजं खरंच पुरेशी नाहीत का अगदी ‘इंटरनॅशनल’ शाळांच्या शाखासुद्धा आजकाल छोट्या शहरांमधे/गावांमधे उघडलेल्या दिसतात. विशिष्ट विषयात शिक्षण घ्यायचंय म्हणून गाव सोडणा-यांची संख्या पूर्वीही कमीच होती आणि आजही कमीच आहे. बहुसंख्य मुलं-मुली इंजिनियरींग / मेडीकल / एमबीए / बीकॉम / बीएससी / बीए ह्यातलंच काहीतरी शिकतात, ज्याची कॉलेजं आजकाल सगळीकडंच निघाली आहेत. मग हाच कोर्स आपल्याच गावात राहून करण्याऐवजी दुसरीकडं का जायचं अगदी ‘इंटरनॅशनल’ शाळांच्या शाखासुद्धा आजकाल छोट्या शहरांमधे/गावांमधे उघडलेल्या दिसतात. विशिष्ट विषयात शिक्षण घ्यायचंय म्हणून गाव सोडणा-यांची संख्या पूर्वीही कमीच होती आणि आजही कमीच आहे. बहुसंख्य मुलं-मुली इंजिनियरींग / मेडीकल / एमबीए / बीकॉम / बीएससी / बीए ह्यातलंच काहीतरी शिकतात, ज्याची कॉलेजं आजकाल सगळीकडंच निघाली आहेत. मग हाच कोर्स आपल्याच गावात राहून करण्याऐवजी दुसरीकडं का जायचं (याचं उत्तर प्रामाणिकपणे स्वतःचं स्वतःला सांगावं.)\n२. पूर्वी चांगले रस्ते बांधले जात नव्हते. कच्च्या मालाच्या वाहतुकीला जास्त वेळ आणि जास्त खर्च लागायचा. त्यामुळं एका मोठ्या उत्पादक कंपनीशेजारीच त्या कंपनीचे सप्लायर आपलं युनिट सुरु करायचे. मग पुण्यात टाटा मोटर्स आणि बजाज ऑटोभोवती शेकडो कंपन्या आणि त्यांमधे हजारो नोक-या अशी परिस्थिती होती. आता चौपदरी/सहापदरी रस्ते झालेत, स्पेशल रेल्वेच काय विमानाचे पण पर्याय उपलब्ध झालेत. ट्रान्सपोर्टच्या गाड्यांची पॉवर आणि कपॅसिटी वाढलीय. घाट कमी होऊन बोगदे वाढलेत. पुणे-मुंबई दोन तासांत, पुणे कोल्हापूर तीन तासांत शक्य झालंय. हे झालं कोअर इंडस्ट्रीचं, मॅन्युफॅक्चरींगचं उदाहरण. आयटी/बीपीओ कंपनी तर कुठं सुरु केली त्यानं काहीच फरक पडत नाही. सगळ्या बँका, इन्शुरन्स कंपन्या, सीसीडी आणि डॉमिनोजसहीत हॉटेल्स, यांच्या शाखा गावोगावी दिसतायत. मग अजून आमच्या गावात पुरेशा नोक-या मिळत नाहीत, हे कारण कितपत खरं आहे\n३. वर सांगितलेल्या सगळ्या सुविधांमुळं नोकरीबरोबरच धंद्यासाठीसुद्धा पूरक वातावरण आपोआपच तयार होतंय. १९९० नंतर ग्लोबलायझेशनमुळं मी अमेरिकेच्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट घेऊन सोलापूरमधे ऑफीस चालवू शकतो. लंडनच्या बँकेला लागणारं सॉफ्टवेअर सांगलीत बसून तयार करु शकतो. शेतीमाल, फळं, दूध, खाद्यपदार्थ यांच्यावर जागच्या जागी प्रक्रिया करुन काही पटीनं उत्पन्न आणि नफा वाढवू शकतो. शिवाय, बाकीच्या सगळ्या उद्योगांना ट्रान्सपोर्टपासून हाऊसकिपिंगपर्यंत आणि ट्रेनिंगपासून केटरींगपर्यंत काय वाट्टेल त्या सेवा पुरवू शकतो. मग आमच्या गावात धंदा चालत नाही, हे कारण खरंच खरं आहे का\n४. आमच्या गावात वीज/पाणी/रस्ते अशा मुलभूत सुविधा नाहीत, हे कारण अजून कुणी देत असलंच तर तो राजकीय वादाचा मुद्दा ठरेल. त्यावर इथं चर्चा न केलेलीच बरी. त्यामुळं या सुविधा नाहीत म्हणून गाव सोडावं लागलं हा मुद्दा आपोआप बाद होतो.\n५. गावोगावी आणि घरोघरी इंटरनेट, मोबाईल, व्हॉट्सएप, फेसबुक, एटीएम, असं जगातलं अद्ययावत तंत्रज्ञान आणि सोयी-सुविधा पोचलेल्या असताना, अजून वेगळं काय आकर्षण शहरात उरलंय असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती आहे खरी. विशेष म्हणजे, ह्या सगळ्या सोयी किंवा टेक्नॉलॉजी जनतेच्या सोयीसाठी किंवा शासनाच्या कृपेनंच मिळाल्यात असंही नाही. मोठमोठ्या कंपन्यांना दूरदूरच्या गावा-शहरांमधे पोटेन्शिअल मार्केट दिसतंय. ते मार्केट कॅप्चर करण्यासाठी त्या कंपन्या स्वतःच लाईट आणि रस्त्यांपासून पेट्रोल आणि इंटरनेटपर्यंत सगळ्या सुविधा दारात आणून उभ्या करतायत, इथून पुढं अजूनच करणार आहेत.\nवरच्या यादीतले ६ आणि ७ नंबरचे मुद्दे खरोखर अजूनही शिल्लक आहेत आणि भविष्यातही राहतील. माझ्या शिक्षणानुसार किंवा कामाच्या आवडीनुसार प्रत्येक गावात/शहरात/राज्यात/देशात कामाच्या संधी असतीलच असं नाही. उदाहरणार्थ, मला पायलट किंवा एअर होस्टेस व्हायचं असेल तर माझ्या गावात विमानतळ यायची वाट बघू शकत नाही. किंवा मला मंत्रालयात नोकरी करायची असेल तर माझं गाव/शहर सोडून मुंबईला जाणं भाग आहे. (विदर्भाचं वेगळं राज्य झालंच तर अजून काहीजणांना आपल्या गावातच संधी मिळेल, पण तो पुन्हा वादाचा मुद्दा असल्यानं इथं नको.) सॅटेलाईट उडवण्यासाठी श्रीहरीकोट्याला जावंच लागेल किंवा चौपाटीवर पाणीपुरीची गाडी लावण्यासाठी जुहूला जावंच लागेल. त्याला पर्याय नाही. त्याचबरोबर, माझ्या गावात/शहरात राहण्याची माझी इच्छाच नसेल किंवा तसंच काही व्यक्तिगत कारण असेल तर मात्र गाव सोडणं आलंच.\nपण या शेवटच्या दोन प्रकारांमधे कितीजण असतील दहा टक्के त्यापेक्षा जास्त तर नक्कीच नसतील. बाकीच्या सत्तर-ऐंशी टक्के लोकांना विचारलं तर वरची पाच कारणंच देतील, जी खरं तर आज तितकीशी व्हॅलिड राहिलेलीच नाहीत.\nमग अजून काही महत्त्वाची आणि खरी कारणं उरतायत का उदाहरणार्थ, आलोय आता मोठ्या शहरात, आता परत कशाला ‘खाली’ जायचं उदाहरणार्थ, आलोय आता मोठ्या शहरात, आता परत कशाला ‘खाली’ जायचं एकदा पुढं आलोय तर परत ‘मागं’ कशाला जायचं एकदा पुढं आलोय तर परत ‘मागं’ कशाला जायचं शहरात परवडत नाही खरं, पण आता परत गेलो तर ‘लोक काय म्हणतील’ शहरात परवडत नाही खरं, पण आता परत गेलो तर ‘लोक काय म्हणतील’ गावाकडं जे वीस वर्षांनंतर येणार आहे ते शहरात आजच आलेलं आहे, मग (भले मी ते रोज वापरणार नसलो तरी) मला ते आजच मिळालं पाहिजे. याशिवाय, विशिष्ट ब्रँन्डचं आकर्षण, विशिष्ट कंपन्यांचं आकर्षण, वगैरे वगैरे कारणं असू शकतात.\nएवढं सगळं पुराण सांगितलंत, मग यावर उपायपण सांगा असं आता तुमचं म्हणणं असेल. आपल्याला प्रत्येक गोष्टीकडं प्रॉब्लेम म्हणूनच बघायला शिकवलं जातंय, त्यामुळं सोल्युशनची अपेक्षा साहजिकच आहे. पण मुळात माझ्या दृष्टीनं याकडं प्रॉब्लेम म्हणून न बघता ‘वस्तुस्थिती’ म्हणून बघितलं पाहिजे. जे आहे ते असं आहे. आणि जे झालंय ते एका दिवसात किंवा एका वर्षात झालेलं नाही. त्यामुळं यात काही बदल अपेक्षित असेल किंवा होणार असेल तर तोही झटपट होणार नाही, हे सुरुवातीलाच मान्य केलेलं चांगलं नाही का\nशिवाय, आपण या सगळ्या सिस्टीमचा छोटासा भाग आहोत. त्यामुळं आपण गाव सोडून आलो म्हणून अपराधी वाटून घ्यायचं कारण नाही. तसंच, आपण गावातच राहिलो म्हणजे पूर्ण विचार करुन निर्णय घेतला आणि शहराचे मोह टाळले, असा आव आणायचंही कारण नाही. संपूर्ण सिस्टीम बदलणं किंवा बदलण्याचा विचार करणंही प्रत्येकाला शक्य नसतं. त्यामुळं माणूस आपापल्या कुवतीनुसार आपापल्या परिस्थितीनुसार ‘बेस्ट पॉसिबल’ निर्णय घेत असतो. त्यात त्याचं काहीही चुकत नाही, असं माझं मत आहे.\nराहिला विषय आर्थिक, प्रादेशिक, सामाजिक समानतेचा. गाव सोडायची गरजच पडली नाही पाहिजे, समतोल विकास झाला पाहिजे, अशा अपेक्षा असतील तर, त्यासाठी विकासाची, प्रगतीची व्याख्या आधी तपासून बघायला लागेल. आज आपण विशिष्ट सोयी, विशिष्ट लोगो, विशिष्ट भाषा, यांना विकासाची लक्षणं मानतोय. माझ्या मते, ‘स्वयंपूर्ण होणं’ म्हणजे खरा विकास. माझ्या गावात/शहरात राहणा-या पाच-पन्नास हजार लोकांच्या जवळपास सर्व गरजा भागवू शकेल असे उद्योग-धंदे सुरु करणं म्हणजे स्वयंपूर्ण बनणं. याचीच दुसरी बाजू म्हणजे, स्थानिक पातळीवर तयार होणारी ही उत्पादनं आणि सेवा वापरुन संपवण्याची लोकांचीसुद्धा इच्छा आणि क्षमता असणं.\nकाही गोष्टींसाठी बाहेरच्या स्रोतांवर अवलंबून रहावं लागेल हे मान्य. उदाहरणार्थ, वीजनिर्मिती, गाड्या, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं उत्पादन, वगैरे. पण अशा गोष्टींची गरज आणि प्रमाण कमीत कमी राहील यासाठी प्रयत्न करता येतीलच. उदाहरणार्थ, सोलर एनर्जीचा वापर, कार्यक्षम सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, इलेक्ट्रॉनिक वस्तुंची दुरुस्ती-देखभाल आणि कार्यक्षम वापर, इत्यादी. सध्या सहज उपलब्ध असलेल्या टेक्नॉलॉजीचा सर्वोत्कृष्ट उपयोग स्वतःला स्वयंपूर्ण बनवण्यामधेच आहे.\nशेवटी, आपण नक्की काय करतोय आणि का करतोय हे प्रामाणिकपणे तपासून बघावं आणि गैरसमज किंवा न्यूनगंड न बाळगता वस्तुस्थितीचा स्विकार करावा, हेच महत्त्वाचं.\nहरकत नाही... (संदीप खरेंची कविता)\nहरकत नाही... (संदीप खरेंची कविता)\nLabels: कविता, मराठी, संग्रह\nरंजिश ही सही, दिल ही दुखाने के लिए आ\nआ फिर से मुझे छोड के जाने के लिए आ\nपहले से मरासिम ना सही, फिर भी कभी तो\nरस्म-ओ-राहे दुनिया ही निभाने के लिए आ\nकिस किस को बतायेंगे जुदाई का सबब हम\nतू मुझसे खफा है तो जमाने के लिए आ\nकुछ तो मेरे पिन्दार-ए-मोहब्बत का भरम रख\nतू भी तो कभी मुझको मनाने के लिए आ\nइक उम्र से हूँ लज्जत-ए-गिरिया से भी महरूम\nऐ राहत-ए-जाँ मुझको रुलाने के लिए आ\nअब तक दिल-ए-खुश फहम को तुझसे हैं उम्मीदें\nये आखिरी शम्में भी बुझाने के लिए आ\nमाना की मोहब्बत का छिपाना है मोहब्बत\nचुपके से किसी रोज जताने के लिए आ\nजैसे तुझे आते हैं ना आने के बहाने\nऐसे ही किसी रोज ना जाने के लिए आ\n- अहमद फराज / तालिब बागपती\nगिरिया = रडू, अश्रू\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जबाबदारी\nजर्मनीच्या संसदेनं गेल्या आठवड्यात 'द नेटवर्क एन्फोर्समेंट एक्ट' हा कायदा मंजूर केला. माध्यमांमधे याला 'फेसबुकचा कायदा' असं म्हटलं जातंय. या कायद्यानुसार, जर्मनीत काम करणार्‍या फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मिडीया कंपन्यांना सर्व प्रकारच्या द्वेषपूर्ण, जातीयवादी, वर्णभेद करणार्‍या, वादग्रस्त कॉमेंट्स किंवा पोस्ट्स, ज्या सरळ-सरळ बेकायदेशीर दिसत असतील, त्या एखाद्या युजरनं रिपोर्ट केल्यापासून २४ तासांच्या आत डिलीट किंवा ब्लॉक कराव्या लागतील. आक्षेपार्ह म्हणून फ्लॅग केलेला मजकूर, जो थेट बदनामी अथवा हिंसाचाराला कारणीभूत ठरणार नाही, त्याच्यावर कारवाई करण्यासाठी कंपन्यांकडं सात दिवसांचा अवधी असेल. असा बेकायदेशीर मजकूर काढून टाकण्यात वारंवार अपयश येत असेल तर या कंपन्यांकडून ५० लाख युरो ते ५ कोटी युरो इतका दंड वसूल केला जाईल.\nया कायद्यानुसार, संबंधित सोशल नेटवर्कला ती केस कशी हाताळण्यात आली याची माहिती तक्रार करणार्‍या युजरला कळवावी लागेल, तसं केलं नाही तर त्या कंपनीच्या जर्मनीतल्या मुख्य प्रतिनिधीला आणखी ५० लाख युरोंचा दंड लावण्यात येईल. एकूण किती तक्रारी नोंदवल्या गेल्या आणि त्या कशा हाताळल्या गेल्या, याचे सार्वजनिक अहवाल कंपन्यांना दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध करावे लागतील.\nहा नागरिकांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याचा सरकारी प्रयत्न आहे असं आपल्यापैकी बर्‍याच जणांना वाटू शकतं. पण, न्यायमंत्री हैको मास यांनी दिलेलं स्पष्टीकरण असं आहे, \"हा कायदा बनवून आम्ही इंटरनेटवरच्या अनिर्बंध आणि अराजक परिस्थितीला लगाम घालून सर्वांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षणच करत आहोत. अपमान होण्याच्या आणि धमकावलं जाण्याच्या भितीपासून मुक्त होऊन प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करता आलं पाहिजे, याची काळजी आम्ही घेत आहोत. त्यादृष्टीनं हा कायदा म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचं बंधन नसून, उलट त्याची मुलभूत गरज आहे.\"\nपारंपारिक (ऑफलाईन) सार्वजनिक माध्यमांकडून जास्त वेगवान आणि सहज उपलब्ध अशा व्यक्तिगत वापराच्या सोशल (ऑनलाईन) मिडीयापर्यंतचा प्रवास आपल्या पिढीनं बघितला आहे. या माध्यमप्रकाराचे फायदे आपल्याला मान्य आहेतच, पण त्याचबरोबर त्याच्या (मुद्दाम अथवा नकळत केल्या जाणार्‍या) गैरवापराबद्दल आपल्याला काळजीही वाटते. फक्त कुणाचं नियंत्रण किंवा संपादन नसल्यामुळं अत्यंत चुकीची आणि खोटी माहिती मोठ्या प्रमाणावर पसरवली जाताना आपण बघतोच. याच कारणामुळं, सोशल मिडीयाच्या तुलनेत वेग आणि व्याप्ती कमी असूनही आजसुद्धा माहिती किंवा बातमीचा अधिकृत स्रोत म्हणून वर्तमानपत्रांकडंच बघितलं जातं. खूप मोठ्या प्रमाणावर जनतेला एकाच वेळी पचवता येईल अशा पद्धतीनं मजकुराचं नियमन किंवा संपादन करता येण्याच्या क्षमतेमुळंच वर्तमानपत्रांचं हे महत्त्व टिकून आहे, असं मला वाटतं.\nवर्तमानपत्रात प्रसिद्ध केल्या जाणार्‍या मजकुराची जबाबदारी भारतातल्या पीआरबी कायद्यांतर्गत संपादकांवर टाकली नसती तर हे नियंत्रण किंवा संपादन नावापुरतंच उरलं असतं. लाखो लोक आमचं वर्तमानपत्र विकत घेतात किंवा वाचतात म्हणून आम्ही काय वाट्टेल ते छापू आणि नंतर त्याच्या परिणामांची जबाबदारी झटकू, हे स्वातंत्र्य वर्तमानपत्रांना नाही. त्यांना कुठलाही मजकूर छापताना काळजी घ्यावी लागते, स्वतःच्या सद्सदविवेकबुद्धीनं ही काळजी घेतली नाही तरी कायदेशीर कारवाईच्या भितीनं तरी ती घ्यावीच लागते. त्यामुळं, सोशल मिडीयावरच्या अनियंत्रित असंपादीत व्यक्तिगत मजकुराच्या तुलनेत हा वर्तमानपत्रीय मजकूर अगदीच किरकोळ वाटू शकतो.\nआता जबाबदार आणि सुजाण नागरिक म्हणून आपल्याला हे ठरवावं लागेल की, आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी थोडा पण दर्जेदार मजकूर महत्त्वाचा आहे की कसलाही आणि काहीही मजकूर उपलब्ध होण्यासाठी माध्यमांचं स्वातंत्र्य जास्त महत्त्वाचं आहे इथं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे वर सांगितलेल्या कायद्यानुसार कुठल्याही युजरला कसलाही मजकूर पोस्ट करायची बंदी घातलेली नाही. या कायद्यानं फक्त या सोशल मिडीया कंपन्यांवर जबाबदारी टाकण्याचं काम केलंय. या कंपन्यांकडून अशा बंधनांना विरोध होणं साहजिक आहे, त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण टाकलेल्या मजकुराचं नियमन केलं जाईल किंवा आपल्याला ब्लॉक केलं जाईल, या भितीनं अशा सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरच्या युजरची संख्या कमी होऊ शकते. आणि आपण या कंपन्यांचं बिझनेस मॉडेल लक्षात घेतलं तर असं दिसून येईल की, त्यांची भरभराटच नव्हे तर त्यांचं अस्तित्वही फक्त आणि फक्त युजरच्या संख्येवर अवलंबून आहे. त्यामुळंच, या प्लॅटफॉर्मवर तयार आणि प्रसिद्ध होणार्‍या मजकुराची आणि आम जनतेवर होणार्‍या त्याच्या परिणामांची त्यांना बिलकुल फिकीर नसते.\nशेवटी जर्मनीच्या न्यायमंत्र्यांचं म्हणणंच योग्य वाटतंय - अपमान होण्याच्या आणि धमकावलं जाण्याच्या भितीपासून मुक्त होऊन प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करता आलं पाहिजे. आणि मजकुराच्या जबाबदारीकडं अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मर्यादा नव्हे तर मुलभूत गरज म्हणून बघितलं गेलं पाहिजे\n- मंदार शिंदे 9822401246 (४ जुलै २०१७)\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जबाबदारी\nया ब्लॉगवरील नवे लिखाण ई-मेलद्वारे मिळवाः\nबालशिक्षण की शालेय शिक्षणाची पूर्वतयारी\nहरकत नाही... (संदीप खरेंची कविता)\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जबाबदारी\nया ब्लॉगवरचे विचार आणि शब्द मुक्त आहेत. तुम्ही वाचा आणि इतरांनाही वाचू द्या. - मंदार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2018-08-18T08:58:53Z", "digest": "sha1:V57JQTFIMMUHEOFMSZGK6JDFURDQNICF", "length": 10225, "nlines": 383, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्पॅनिश भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nयुरोपचा काही भाग, मध्य अमेरिका व दक्षिण अमेरिकेचा काही भाग, उत्तर अमेरिका व कॅरिबियन बेटांचा काही भाग, उत्तर आफ्रिका (इक्वेटोरियल गियाना, पश्चिम सहारा) आणि आशिया-प्रशांत (फिलिपाईन्स)\nस्पेन, आर्जेन्टिना, बोलिव्हिया, चिली, कोलंबिया, कॉस्टा रिका, क्युबा, डॉमिनिकन प्रजासत्ताक, इक्वेडोर, एल साल्वाडोर, इक्वेटोरियल गियाना, युरोपीय महासंघ, ग्वाटेमाला, होन्डुरास, मेक्सिको, निकाराग्वा, पनामा, पॅराग्वे, पेरू, पोर्तो रिको, संयुक्त राष्ट्रे, उरुग्वे, व्हेनेझुएला\n८ काही तुलनात्मक उदाहरणे\nजगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या २० भाषा\nमँडेरिन · हिंदी/उर्दू · स्पॅनिश · इंग्लिश · पोर्तुगीज · अरबी · फ्रेंच · बंगाली · रशियन · जपानी · जर्मन · तेलुगू · पंजाबी · कोरियन · वू · बासा जावा · तमिळ · फारसी · मराठी · व्हियेतनामी · इटालियन\nयुरोपियन संघाच्या अधिकृत भाषा\nबल्गेरियन • क्रोएशियन • चेक • डॅनिश • डच • इंग्लिश • एस्टोनियन • फिनिश • फ्रेंच • जर्मन • ग्रीक • हंगेरियन\nआयरिश • इटालियन • लात्व्हियन • लिथुएनियन • माल्टी • पोलिश • पोर्तुगीज • रोमेनियन • स्लोव्हाक • स्लोव्हेन • स्पॅनिश • स्वीडिश\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १६:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/hand-blender/life-crystal+hand-blender-price-list.html", "date_download": "2018-08-18T08:08:03Z", "digest": "sha1:L6X2V6GUTBNXF6EEQG3IPM2LNIZJRMUJ", "length": 15577, "nlines": 402, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "लिफे क्रिस्टल हॅन्ड ब्लेंडर किंमत India मध्ये 18 Aug 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nलिफे क्रिस्टल हॅन्ड ब्लेंडर Indiaकिंमत\nIndia 2018 लिफे क्रिस्टल हॅन्ड ब्लेंडर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nलिफे क्रिस्टल हॅन्ड ब्लेंडर दर India मध्ये 18 August 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 2 एकूण लिफे क्रिस्टल हॅन्ड ब्लेंडर समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन लिफे क्रिस्टल रेगुलर हॅन्ड ब्लेंडर आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Snapdeal, Naaptol, Homeshop18, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी लिफे क्रिस्टल हॅन्ड ब्लेंडर\nकिंमत लिफे क्रिस्टल हॅन्ड ब्लेंडर आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन लिफे क्रिस्टल द 101 200 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट Rs. 899 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.795 येथे आपल्याला लिफे क्रिस्टल रेगुलर हॅन्ड ब्लेंडर उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nशीर्ष 10लिफे क्रिस्टल हॅन्ड ब्लेंडर\nताज्यालिफे क्रिस्टल हॅन्ड ब्लेंडर\nलिफे क्रिस्टल रेगुलर हॅन्ड ब्लेंडर\nलिफे क्रिस्टल द 101 200 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 W\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/lobhi-manushya-isapniti-katha/", "date_download": "2018-08-18T09:16:36Z", "digest": "sha1:RCGJYC74YLELTJ4RMOGBPXCYQBSMUHGD", "length": 7823, "nlines": 140, "source_domain": "www.marathimati.net", "title": "लोभी मनुष्य | Lobhi Manushya", "raw_content": "\nएका लोभी मनुष्याने आपला सगळा पैसा शेतांत पुरून ठेविला होता. तेथे दिवसांतून दोन वेळा जाऊन व त्या पैसा पुरलेल्या जागेकडे पाहून तो मोठा आनंद मानीत असे. ते त्याचे कृत्य त्याच्या गडयाने पाहिले आणि तर्क केला की आपला धनी या जागेकडे नित्य पाहतो, तस्मात्‌ येथे काही तरी पुरलेले असावे. मग त्याने रात्रौ त्या ठिकाणी जाऊन खणून पाहिले तो आंत बरेचसे द्रव्य त्याच्या दृष्टीस पडले. मग ते घेऊन तो पळून गेला. दुसऱ्या दिवशी तो लोभी मनुष्य नित्याप्रमाणे तेथे येऊन पाहतो तो सगळे द्रव्य चोरीस गेले आहे, असे त्यास दिसून आले. मग त्याने डोईंत धूळ घातली, ऊर बडवूं लागला आणि हाय हाय करून रडत बसला. शेवटी त्याचा शेजारी त्याजपाशी आला आनि त्याने त्यास रडण्याचे कारण विचारले. लोभी मनुष्याने द्रव्य चोरीस गेल्याची हकीकत त्यास सांगितली. ती ऐकून शेजारी म्हणाला, ‘अरे, मला वाटते की तुझे काहीच गेले नाही. आपला पैसा गेला, ही गोष्ट लक्षांत न आणिता, पूर्वीप्रमाणेच या जागेकडे तू पहात जा, म्हणजे झाले. ’\nतात्पर्य:- लोभी आहेत, ते पैसा असून दरिद्री; व अशा लोकांचा पैसा शेवटी त्यांच्या उपयोगी न पडता भलताच कोणी तरी तो खाऊन जातो. जवळ असलेल्या द्रव्याचा जर कधी उपयोगी करावयाचा नाही, तर ते चोरीस गेल्याबद्दल शोक तरी का करावा \nया वर्गातील आणखी काही लेख\nदैव आणि गावंढळ मनुष्य\nतरूण मनुष्य आणि त्याचे मांजर\nगरुड पक्षी आणि मनुष्य\nमनुष्य आणि त्याचा लाकडी देव\nम्हातारा आणि त्याचा घोडा\nमधमाशा आणि त्यांचा धनी\nदेव आणि नास्तिक मनुष्य\nThis entry was posted in इसापनीती कथा and tagged इसापनीती, कथा, गोष्ट, गोष्टी, धूळ, पैसा, मनुष्य on जुन 26, 2011 by मराठीमाती.\n← जगाचा गुलाम कासव आणि बेडूक →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://blog.railyatri.in/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%93%E0%A4%A2%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-18T08:21:51Z", "digest": "sha1:DM635BPKUP2LB5SUKTGL3NYJSSQEXHJ7", "length": 9730, "nlines": 98, "source_domain": "blog.railyatri.in", "title": "साखळी ओढण्याच्या वस्तुस्थिती, ज्यांच्याविषयी तुम्ही अनभिज्ञ आहात -", "raw_content": "\nसाखळी ओढण्याच्या वस्तुस्थिती, ज्यांच्याविषयी तुम्ही अनभिज्ञ आहात\nसाखळी ओढण्याच्या वस्तुस्थिती, ज्यांच्याविषयी तुम्ही अनभिज्ञ आहात\nट्रेन्समधून प्रवास करताना तुम्ही प्रत्येक कोचमध्ये आपत्कालीन साखळ्या पहिल्या असतील. तथापि, साखळी ओढण्यातील करावे आणि करू नये विषयी तुम्हाला कदाचित जाणीव नसेल. साखळी ओढण्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी खालील बाबी वाचा.\nएखादा साखळी ओढतो तेव्हा ट्रेन कशी थांबते\nया अलार्मच्या साखळ्या ट्रेनच्या मुख्य ब्रेक पाईपळा जोडलेल्या असतात. ही ब्रेक पाईप हवेचा एक स्थिर दाब राखते, ज्यामुळे ट्रेन सुरळीतपणे चालते. जेव्हा आपत्कालीन साखळी ओढली जाते, तेव्हा त्या ब्रेक पाईपमध्ये संचय केलेली हवा एका छोट्याशा व्हेंटमधून बाहेर पडते. हवेच्या दाबत आलेल्या कमीमुळे ट्रेनची गति संथ होते. लोको पायलट हवेच्या दाबात झालेली घट पटकन जाणून घेतो आणि ट्रेन थांबविण्यास सुरुवात करतो. अरुंद रुळांवर ट्रेन धावत असताना, त्याला एकदम थांबविता येत नाही, कारण त्यामुळे असंतुलन होऊन ट्रेन रुळावरून घसरू शकते.\nओढलेल्या साखळीविषयी आरपीएफला कसे कळते\nकोचेसना आपत्कालीन फ्लॅशर्स लावलेले असतात आणि साखळी ओढताक्षणी हे फ्लॅशर्स सक्रिय होतात. एक लाईट चालू–बंद होऊ लागते आणि लोकोमोटिव्ह पायलटच्या कंट्रोल्समध्ये ध्वनी गुंजू लागतो. आणि हे सर्व गार्ड, असिस्टंट ड्रायव्हर आणि आरपीएफ कर्मचारी साखळी ओढल्याच्या स्थानावर पोहोचेपर्यंत आणि हातांनी ती साखळी रिसेट करेपर्यंत घडत राहते. साखळी रिसेट केल्यावर हवेचा दाब हळूहळू सामान्य होतो आणि ट्रेन निघण्यास तयार होते. आरपीएफ त्या कोचमधील प्रवाश्यांना ती साखळी कोणी ओढली हे शोधण्यासाठी प्रश्न करतात.\nसाखळी ओढल्याबद्दल कोणती शिक्षा आहे\nवैध कारणाशिवाय साखळी ओढणे भारतीय रेल्वेज कायद्याच्या कलम 141 च्या अंतर्गत एक दंडनीय गुन्हा आहे. या कायद्यानुसार, “जर एखाद्या प्रवाश्याने कोणत्याही पर्याप्त कारणाशिवाय ट्रेनचा रेल्वे अधिकारी इन–चार्ज आणि प्रवासी यांच्यादरम्यान संभाषणात व्यत्यय आणला, तर त्याला दोषी मानले जाईल.” दोषी सिद्ध झाल्यावर, त्या व्यक्तीला एक वर्षापर्यंत कारावास किंवा 1000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.\nसाखळी ओढण्यासाठी स्वीकार्य परिस्थिती कोणत्या आहेत\nट्रेनमधील साखळी ओढण्यासाठी काही स्वीकार्य परिस्थितींमध्ये आहेत: एखादा सहा–प्रवासी चालत्या ट्रेनमधून खाली पडला, ट्रेनमध्ये आग लागली, स्टेशनवर कुटुंबातील एखादा सदस्य मागे राहिला, एखाद्या अतिशय वयस्क व्यक्तीबरोबर किंवा अपंग व्यक्तीबरोबर ट्रेनवर चढताना जेथे थांबण्याची वेळ अपुरी असेल, वैद्यकीय आपत्काल, चोरीसारखे सुरक्षा आपत्काल, इ.\nसाखळी ओढल्याने ट्रेनवर कोणतीही प्रत्यक्ष हानी होते काय\nपूर्ण वेगात असताना साखळी ओढल्यास, ट्रेन रुळावरून घसरण्याची बरीच संभावना असते. सोबत, ट्रेन अचानक थांबल्याने (साखळी ओढल्याने) चैन रिअक्शन सुरु होऊ शकते. यामुळे तुम्ही ट्रेनवर असताना त्याला विलंबच होत नाही, तर त्याच मार्गावर चालणाऱ्या पुढील ट्रेन्सना देखील विलंब होतो.\nPrevious Postभेट दिलीच पाहिजे असे 6 दमण आणि दीव बीचेस Next Postकन्फर्म्ड ट्रेन तिकिटे मिळविण्याचे 5 मार्ग\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nसामान नेण्याचे नवे नियम\nट्रँक्वेबारच्या डॅनिश शहरावर ओझरती नजर\nरेलयात्री बस सेवा उत्तम का आहे\nप्रवासात खाण्यासाठी आरोग्यदायी सूचना\nया उन्हाळ्यात तुम्हाला व्यस्त ठेवण्यासाठी मजेदार उपक्रमे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://telisamajsevak.com/author/nile83teli/", "date_download": "2018-08-18T08:31:01Z", "digest": "sha1:QVH37CCIVWIV5XZEXEW3T6DZ7MZX22DK", "length": 8454, "nlines": 101, "source_domain": "telisamajsevak.com", "title": "Nilesh Suryawanshi, Author at तेली समाज सेवक", "raw_content": "\nजिसके साथ तेली वो भाग्यशाली\nराज्यस्तरीय तेली समाज वधू-वर व पालक परिचय मेळावा\nतेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा पिंपरी चिंचवड पुणे 2017\nतेली तितुका मेळवावा समाज धर्म वाढवावा \nठळक घडामोडी ताज्या घडामोडी\nजिसके साथ तेली वो भाग्यशाली\nजिसके साथ तेली वो भाग्यशाली मा.मुख्यमंत्री काय म्हणाले नक्की विडीओ पाहा: तालकटोरा स्टेडियम, दिल्ली येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेन्द्रजी\nदुःखद निधन समाज वार्ता\nगं. भा. विठाबाई गणपत लांडे यांचे रविवार दिनांक ३/६/२०१८ रोजी दुःखद निधन झाले. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.\nदुःखद निधन समाज वार्ता\nकै. सौ. सरला अरुण वाघचौरे यांचे शुक्रवार दिनांक १/६/२०१८ रोजी दुःखद निधन झाले. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.\nताज्या घडामोडी तेली विश्व वधु-वर मेळावा\nराज्यस्तरीय तेली समाज वधू-वर व पालक परिचय मेळावा\nनाशिक शहर तेली समाज नाशिक आयोजित वधु-वर पालक मेळावा २०१७ नाव नोंदणी चालु झाली आहे. संपर्क- श्री संताजी मंगल कार्यालय,अशोकस्तंभ,\nताज्या घडामोडी वधु-वर मेळावा\nतेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा पिंपरी चिंचवड पुणे 2017\nOctober 13, 2017 October 27, 2017 Nilesh Suryawanshi 0 Comment पिंपरी चिंचवड आयोजित, वधु-वर पालक मेळावा, संताजी सेवा प्रतिष्ठान\nसंताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड आयोजित वधु-वर पालक मेळावा २०१७ संपर्क कार्यालय व फार्म स्विकारण्याचा पत्ता संताजी सेवा प्रतिष्ठान,\nपुणे तेली समाज निवडणूक प्रचार सभा\nश्री संताजी प्रतिष्ठान, पुणे-नगर रोड समाजबांधव, रविवार दि 13/08/2017 रोजी मासिक सभा तसेच पुणे तेली समाज निवडणूक प्रचार सभा आहे.\nरक्षाबंधनाचे महत्व आणि माहिती\nहिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण\nघरी बसून ऑनलाइन पैसा कमावण्याची आयडिया खूप लोकप्रिय ठरत‍ आहे. या पार्श्वभूमीवर लोकांना घरबसल्या ऑनलाइन जॉब (Work Form Home) करण्याच्या\nमहाराष्ट्र केसरी विजय चौधरीला सरकारकडून नोकरी\nआपल्या तेली समाजाची शान जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावचा ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आश्वासन पूर्ण\nसंताजी महाराजांचे घाण्यावरील अभंग\nमाझिया जातीचा मज भेटो कोणी \nमाझिया जातीचा मजशी मिळेल \nकळेल तो सर्व समाचार \nसंतु म्हणे येथे पाहिजे जातीचे \nयेर गबाळाचे काम नाही \nजिसके साथ तेली वो भाग्यशाली June 8, 2018\nदशक्रिया विधी June 8, 2018\nदशक्रिया विधी June 7, 2018\nराज्यस्तरीय तेली समाज वधू-वर व पालक परिचय मेळावा October 22, 2017\nतेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा पिंपरी चिंचवड पुणे 2017 October 13, 2017\nसंताजी महाराजांचे घाण्यावरील अभंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/auto-expo-2017-39973", "date_download": "2018-08-18T08:38:41Z", "digest": "sha1:BHMASSMTXVICOC2T2U4ZYLIYY5PSTKQT", "length": 12645, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Auto Expo 2017 कार घेण्याचे स्वप्न करा साकार | eSakal", "raw_content": "\nकार घेण्याचे स्वप्न करा साकार\nशुक्रवार, 14 एप्रिल 2017\nपुणे - अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर आपल्या घरी स्वप्नातील कार यावी, असे प्रत्येकालाच वाटते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी \"सकाळ माध्यम समूहा'ने शनिवारी (ता. 15) भव्य \"ऑटो एक्‍स्पो 2017' चे आयोजन केले आहे.\nपुणे - अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर आपल्या घरी स्वप्नातील कार यावी, असे प्रत्येकालाच वाटते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी \"सकाळ माध्यम समूहा'ने शनिवारी (ता. 15) भव्य \"ऑटो एक्‍स्पो 2017' चे आयोजन केले आहे.\nशुभमुहूर्तावर आपल्या घरी आवडती कार दाखल व्हावी, असे प्रत्येकालाच वाटते. मात्र, ऐनवेळी कार घ्यायची म्हटल्यावर ठिकठिकाणच्या शोरूमला भेटी द्यायच्या, विविध कंपन्यांच्या गाड्यांच्या फीचर्सची माहिती घ्यायची, त्यांची तुलना करायची, बजेट लक्षात घ्यायचे अशा शेकडो प्रश्‍नांची उत्तरे शोधत फिरावे लागते; पण या साऱ्या प्रश्‍नांची उत्तरे जेव्हा एकाच छताखाली मिळतात, तेव्हा खऱ्या अर्थाने कार घेण्याचे स्वप्न वास्तवात उतरते. याचाच विचार करून \"सकाळ'ने दोन दिवसांच्या ऑटो एक्‍स्पोचे आयोजन केले आहे. गाडी घेणाऱ्यांसाठी हा एक्‍स्पो महत्त्वाचा ठरणार आहे. कारण, येथे विविध कार ब्रॅंडस्‌च्या फीचर्सची माहिती मिळणार आहे. शिवाय नव्या आणि प्री-ओन्ड कारची मोठी शृंखलाही पाहायला मिळणार आहे.\nयामध्ये ह्युंदाई, विराज स्कोडा, विद्युत मोटर्स- फोक्‍सवॅगन, रोहर्ष मोटर्स- रेनॉ, होंडा कार्स, माय कार नेक्‍सा आदी कंपन्या सहभागी होणार असून, मारुती ट्रू व्हॅल्यूच्या प्री-ओन्ड कारची माहितीही उपलब्ध होणार आहे. पंडित फार्म, म्हात्रे पुलाजवळ, कर्वेनगर येथे शनिवार (ता. 15) आणि रविवार (ता. 16) हा एक्‍स्पो होणार असून, स्मॉल कार्स, सेडान कार, हॅच बॅक कार, लक्‍झरी कार, एसयूव्ही, स्पोर्ट अशा कितीतरी गाड्यांची माहिती मिळणार आहे. त्यांच्या किमती आणि \"ईएमआय'संबंधीच्या प्रश्‍नांची उत्तरे आपल्याला येथे मिळणार आहेत. दोन दिवस चालणारा हा एक्‍स्पो सकाळी 11 ते रात्री 7 या वेळेत सर्वांसाठी खुला आहे.\nकाय : ऑटो एक्‍स्पो 2017\nकुठे : पंडित फार्मस्‌, म्हात्रे पुलाजवळ, कर्वेनगर\nकधी : 15 आणि 16 एप्रिल\nकेव्हा : सकाळी 11 ते रात्री 7\nसुविधा ः प्रवेश व पार्किंग मोफत\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून सहाजण जखमी\nबेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने बंगळूरकडे जाणारी व्हीआरएलची आराम बस उलटून चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय...\nपिंपळवंडीला मानव-बिबट सहजीवन जनजागृती\nजुन्नर - पिंपळवंडी ता.जुन्नर येथे मानव व बिबट संघर्ष व सहजीवन याविषयी मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती करण्यात आली. जुन्नर वन विभाग तसेच...\nघरकामगार, बांधकाम मजूर महिलांची उपेक्षाच\nजळगाव : दिवसरात्र काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, पण डोक्‍यावर हक्काचं छत नाही...सतत कष्ट करूनही पदरी काहीच न पडल्यामुळे अनेकदा उपवास...\nवाहून गेलेला तरुण तीस तासांनंतरही सापडेना\nजळगाव ः येथील अयोध्यानगराजवळील नाल्याला काल झालेल्या पावसामुळे पूर आला होता. या पुरात इतर नागरिकांना मदत करणारा तरुण पाय घसरून नाल्यात पडून वाहून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/hingoli-district-process-successful-entrepreneurs-31641", "date_download": "2018-08-18T08:34:45Z", "digest": "sha1:DNTOLM26CIB7N3IFAABXWCPQAZHI5TVC", "length": 21673, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Hingoli district in the process of successful entrepreneurs हिंगोली जिल्ह्यात घडला यशस्वी प्रक्रिया उद्योजक | eSakal", "raw_content": "\nहिंगोली जिल्ह्यात घडला यशस्वी प्रक्रिया उद्योजक\nबुधवार, 22 फेब्रुवारी 2017\nहिंगोली जिल्ह्यातील बोरी सावंत येथील उच्चशिक्षित भगवान सावंत यांनी आपल्या परिसरातील संधी शोधली. त्यातून दुग्धप्रक्रिया व्यवसाय आकारास आणला. प्रक्रिया उद्योजक म्हणून अोळख तयार केली. दूध, पनीर, खवा या मुख्य पदार्थांच्या निर्मितीबरोबर अन्य पदार्थांना मार्केट मिळवून दिले. भागातील चारशेहून अधिक दूध उत्पादकांनाही त्या माध्यमातून दूधविक्रीसाठी हक्काचे मार्केट मिळाले.\nहिंगोली जिल्ह्यातील बोरी सावंत येथील उच्चशिक्षित भगवान सावंत यांनी आपल्या परिसरातील संधी शोधली. त्यातून दुग्धप्रक्रिया व्यवसाय आकारास आणला. प्रक्रिया उद्योजक म्हणून अोळख तयार केली. दूध, पनीर, खवा या मुख्य पदार्थांच्या निर्मितीबरोबर अन्य पदार्थांना मार्केट मिळवून दिले. भागातील चारशेहून अधिक दूध उत्पादकांनाही त्या माध्यमातून दूधविक्रीसाठी हक्काचे मार्केट मिळाले.\nबोरी सावंत (ता. वसमत, जि. हिंगोली) येथील भगवान सावंत यांची सहा एकर वडिलोपार्जित शेती आहे. कोरडवाहू जमीन असल्याने सक्षम उत्पन्नाची खात्री नव्हती. या परिस्थितीत सावंत यांची डाॅक्टर होण्याची इच्छा होती; परंतु ‘मेडिकल’चा प्रवेश हुकल्याने त्यांना बी.एस्सी.ला प्रवेश घ्यावा लागला. त्यांनी एम. एस्सी.(रसायनशास्त्र) पदवीही संपादन केली.\nनोकरीच्या सुरवातीच्या काळात काही काळ साखर कारखान्यामध्ये पर्यवेक्षक म्हणून काम केले. सन २००२ मध्ये सावंत गंगाखेड येथील कृषी विद्यालयाचे प्राचार्य झाले. त्यांच्या पुढाकारातून कडकनाथ कोंबडी, श्वान, शेळी फार्म, रोपवाटिका, गांडूळ खतनिर्मिती असे विविध शेतीपूरक उपक्रम सुरू झाले.\nसन २०१२ मध्ये गंगाखेड येथे भागीदारीतून दूध डेअरी उद्योग सुरू केला. तेथे दररोज ५ हजार लिटर दुधाचे पॅकिंग व विक्री व्हायची. त्याचवेळी गावात राजे छत्रपती दूधउत्पादक व पुरवठा सहकारी संस्थेच्या माध्यमातून दूध संकलन सुरू केले. पुतण्या राजू सावंत आणि भाचा अंगद चव्हाण यांच्यावर व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवली. तेथून गंगाखेड येथील डेअरीला दूध पुरवठा केला जात असे. परंतु, वाहतूक खर्च परवडत नसल्यामुळे परभणी येथील शासकीय दूध डेअरीला पुरवठा सुरू केला. दरम्यान, वसमत तालुक्यातील ‘एनडीडीबी’ संस्थेचे दूध संकलन केंद्र बंद झाले होते. तेथील दूध उत्पादकांना सावंत यांच्या डेअरीचा पर्याय मिळाला. परंतु, शासकीय डेअरीकडून रास्त भाव मिळत नव्हता. त्यामुळे डेअरी उद्योगातील अनुभवाच्या जोरावर सावंत यांनी स्वतःचा दूधप्रक्रिया उद्योग सुरू करीत\n२०१३ मध्ये प्रभावती डेअरी फार्मची नोंदणी केली. जवळा बाजार (जि. हिंगोली) येथे पॅकिंग युनिट सुरू केले. दोन वर्षांच्या दुष्काळामुळे दूध उत्पादन घटले. त्यामुळे पॅकिंग युनिट पुणे जिल्ह्यात स्थलांतरित करावे लागले. तेथे दूध प्रक्रिया पॅकिंग युनिट आहे. सावंत यांचा भाचा तसेच मित्र संतोष सातकर तेथील व्यवस्थापन पाहतात. येथून मुंबईला सुमारे दोन हजार तर पुण्याला सुमारे तीन हजार लिटर दूध जाते.\nया उद्योगातून साधारणतः खर्च जाता १५ ते २० टक्के नफा मिळतो. सावंत यांनी शैक्षणिक नोकरी सोडून दिली. परंतु आता त्याहून सक्षम उत्पन्न ते मिळवित आहे. दूध विक्रीच्या तुलनेत प्रक्रिया पदार्थांपासून अधिक नफा मिळतो. आगामी काळात दूध पॅकिंग युनिट, चिज निर्मिती सुरू करण्याचा मानस असल्याचे सावंत यांनी सांगितले.\nप्रत्येक दूध उत्पादकास कोड क्रमांक दिला आहे. दुधाची प्रत, संकलन, दर, त्यानुसार येणारी रक्कम आदी नोंदी ठेवल्या जातात. दूध उत्पादकांना दर रविवारी आठवडी बाजारादिवशी रोखीने पेमेंट केले जाते. रक्कम मोठी असेल तर चेकही दिला जातो. यंत्राद्वारे बिल दिले जाते.\nअकोट, परतूर, बीड, निलंगा, जळगाव येथील दूध प्रकिया उद्योजकांना सावंत मार्गदर्शन करतात.\nउद्योगासाठी बॅंकेचे कर्ज अथवा कोणत्याही योजनेचे अनुदान घेतलेले नाही. महाराष्ट्र फार्मर्स फांउडेशनतर्फे दीड लाख व स्वतःचे एक लाख रुपये अशी अडीच लाख रुपयांची गुतंवणूक करून उद्योगाची सुरवात केली.\nसावंत यांनी १० एकर शेतजमीन खरेदी केली आहे. त्यांच्या १२ म्हशी असून दररोज शंभर लिटरपर्यंत दूध मिळते.\nसावंत आपल्या उद्योगातील वाटचालीत अॅग्रोवनचा मोठा वाटा असल्याचे नमूद करतात. त्यातील यशोगाथा त्यांना प्रेरणादायी वाटतात. यशकथांचे त्यांनी संकलन केले आहे.\nव्यवसायातील कौशल्य व गुणवत्ता आत्मसात करण्यासाठी त्यांनी सकाळ माध्यम समूहांतर्गत संस्थेतील लागवड व दुग्ध व्यवसाय प्रक्रिया अशी दोन प्रशिक्षणे घेतली आहेत. शिवाय रसायनशास्त्रातील उच्च पदवीधर व स्वअध्ययनाचाही फायदा उद्योगात झाल्याचे सावंत यांनी सांगितले.\nसावंत यांचा आजचा उद्योग\nसन २०१५ मध्ये सावंत नोकरी सोडून पूर्णवेळ उद्योगात उतरले. सध्या जवळा बाजार येथे भाडेतत्त्वावरील जागेत प्रभावती डेअरी फार्म- तेथे दोनवेळा दूध संकलन, येथे दूध तपासणी यंत्र, एकहजार लिटर क्षमतेचे बल्क कूलर, २ डीप फ्रीजर, खवानिर्मिती यंत्र, क्रीम सेपरेटर, वाहतूक क्रेट आदी यंत्रसामग्री. अौंढा नागनाथ आणि वसमत येथेही संकलन केंद्रे सुरू केली आहेत.\nविक्री उत्पादने व फोकस\nदूध - दररोज ४०० लिटर विक्री. दर - ५० रुपये प्रति लिटर.\nदही - २०० लिटर दुधापासून निर्मिती\nपनीर - (म्हशीच्या दुधापासून) दररोज ७० ते १०० किलो\nखवा - (गायीच्या दुधापासून) दररोज ६० ते १०० किलो\nदररोज १० किलो तूप तर दह्यापासून चक्का व श्रीखंड, आम्रखंड, ताक, लस्सी ही उत्पादने तयार केली जातात. धार्मिक कार्यक्रम, लग्न समारंभातील मागणीनुसार बासुंदी.\nशिल्लक दूध मालेगांव (जि. नांदेड) येथे पाठवले जाते.\nदर - (घाऊक आणि कंसात किरकोळ विक्रीचे प्रतिकिलो)\nतूप ४३० रुपये (४५० रुपये), दही ४० रुपये (५० रुपये),\nपनीर २०० रुपये (२४० रुपये)\nग्राहक - मुख्यतः नांदेड शहरातील हाॅटेल व्यावसायिक व अन्य\nसध्या उद्योगाची वार्षिक उलाढाल सुमारे एक कोटी रुपये.\nसुरवातीला तीन कर्मचारी होते. आता १२ जणांना रोजगार मिळाला आहे.\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nबारामती - विद्या प्रतिष्ठानच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पुरस्कार\nबारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nपंकज भूसे यांचा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव\nसरळगांव - महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी होऊन दिलेल्या उद्दिष्टा पेक्षा जास्त वृक्ष लागवड करून उत्कृष्ट कामगिरी केल्याने...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%98%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2018-08-18T09:08:33Z", "digest": "sha1:65B5MAOQBSGAXY5XROIJ3RTG5HANLX5X", "length": 5010, "nlines": 60, "source_domain": "m4marathi.com", "title": "लॅम्पने सजवा घर | m4marathi", "raw_content": "\nघर सजवा लॅम्पने .\nघर सजविण्यासाठी आपण छोट्या-छोट्या वस्तू घेत असतो. कुठे काय चांगले दिसेल, याबद्दल आपण खुप च्युझी असतो. त्याचप्रमाणे इंटेरियर डेकोरेर्ट्स बोलावून घर कसे चांगले डेकोरेट करता येईल हे बघतो. आधी अभ्यासाला टेबल लॅम्प वापरत असत; परंतु आता अभ्यासाबरोबरच लॅम्पने घर कसे सजवता येईल, याकडे लक्ष दिले जाते. लॅम्पमध्येही वेगवेगळे प्रकार आले आहेत. कागदी लॅम्प, टेबल लॅम्प, वूडन लॅम्प, एलईडी लॅम्प आदी प्रकार आले आहेत; शिवाय आपल्याला हवा तसा लॅम्प आपण बनवूनही घेऊ शकतो. हॅालमध्ये फ्लोरोसन्ट लॅम्प, एलईडी लॅम्प, वूडन लॅम्प, स्टॅण्ड लॅम्प आदी लॅम्प लावले जातात. जेणे करून लॅम्पच्या प्रकाशाने डोळ्यांना जास्त त्रासही होत नाही. त्याचप्रमाणे बेडरुम लॅम्पचे अनेक प्रकार आहेत. हार्ट लॅम्प, ब्रॅण्ड फ्लोअर लॅम्प, रेमी लॅम्प, पेपर लॅम्प आदी प्रकार आहेत आणि तेही वेगवेगळ्या आकारात काटरून, गुलाबाच्या फुलाच्या आकारामध्ये लॅम्प बाजारात बघायला मिळतात.\nत्याचप्रमाणे अभ्यासासाठी किंवा काहींना रात्री पुस्तक वाचण्याचा छंद असतो. टेबल लॅम्पमध्ये गोल्डन रे लॅम्प, डेस्क लॅम्प, स्टॅण्ड लॅम्प, सेलिंग लॅम्प, क्लासिकल आदी लॅम्पचे प्रकार बघायला मिळतात. या लॅम्पमुळे डोळ्यांना त्रासही होत नाही. अँडजेस्टेबल असल्यामुळे हवा तसा अँडजेस्ट करता येतो. त्याच प्रमाणे या सगळ्या लॅम्पच्या किंमतीही तेवढय़ाच जास्त आहे. लोकांमध्ये त्याची क्रेझ जास्त वाढत चालली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-pune-breaking-news-kurivilla-52695", "date_download": "2018-08-18T08:28:15Z", "digest": "sha1:4YLGMIVOVL4XTCY4WMQNPAQOWQCGSJDN", "length": 13074, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news pune news pune breaking news kurivilla जल व्यवस्थापनातील यंत्रसामुग्रीचा कौशल्यपूर्ण वापर आवश्यक : कुरुवील्ला | eSakal", "raw_content": "\nजल व्यवस्थापनातील यंत्रसामुग्रीचा कौशल्यपूर्ण वापर आवश्यक : कुरुवील्ला\nबुधवार, 14 जून 2017\n\"देशात जल व्यवस्थापनासाठी आवश्‍यक ती अद्ययावत यंत्रसामुग्री आपल्याकडे उपलब्ध केली जात आहे. मात्र त्याचा सुयोग्य वापर करण्यासाठीचे कौशल्य विकसित करण्याची आवशकता आहे', असे प्रतिपादन प्रसारण मंत्रालय अंतर्गत असलेल्या ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सलटंट इंडिया लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष जॉर्ज कुरुवील्ला यांनी केले.\nखडकवासला (पुणे) - \"देशात जल व्यवस्थापनासाठी आवश्‍यक ती अद्ययावत यंत्रसामुग्री आपल्याकडे उपलब्ध केली जात आहे. मात्र त्याचा सुयोग्य वापर करण्यासाठीचे कौशल्य विकसित करण्याची आवशकता आहे', असे प्रतिपादन प्रसारण मंत्रालय अंतर्गत असलेल्या ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सलटंट इंडिया लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष जॉर्ज कुरुवील्ला यांनी केले.\nखडकवासला येथील केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेच्या 101व्या वर्धापन दिनानिमित्त \"जलसंपत्ती व्यवस्थापनातील स्वयंचलित व उदयोन्मुख कौशल्यांची आवश्‍यकता\" या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जॉर्ज कुरुवील्ला उपस्थित होते. कौशल्य परिषदेच्या आयएएससी विभागाचे अध्यक्ष नरेंद्र गोयल, जागतिक बॅंकेच्या जलसंपत्ती विभागाचे प्रतिनिधी अनिश बन्सल, केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेच्या मुख्य संचालक व्ही व्ही भोसेकर, सह संचालक राहुल जगताप, शास्त्रज्ञ एम के पवार, उपस्थित होते.\n\"संबधित क्षेत्रातील पात्र व्यक्तीमध्ये काम करण्याचे कौशल्य आहे का, नसल्यास त्याला प्रशिक्षण देऊन त्याला परिपूर्ण करण्याचे काम आम्ही करतो.\" असे गोयल यांनी सांगितले. \"जलसंपत्ती विभागात वापरली जाणारी, यंत्रसामुग्री, त्या तयार करणाऱ्या कंपन्या, शास्त्रज्ञ तज्ञ, प्रत्यक्ष जलसंपत्ती विभागात काम करणारे अधिकारी यांना एकत्रित आणण्याचे काम आमच्या संस्थेने केले आहे. असे संस्थेच्या मुख्य संचालक भोसेकर यांनी सांगितले. यावेळी, बन्सल यांनी जल व्यवस्थापनात जग बाहेर वापरल्या जाणाऱ्या यंत्र सामुग्री आणि अनुभव यावेळी सांगितले.\nबारामती - विद्या प्रतिष्ठानच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पुरस्कार\nबारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nपंकज भूसे यांचा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव\nसरळगांव - महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी होऊन दिलेल्या उद्दिष्टा पेक्षा जास्त वृक्ष लागवड करून उत्कृष्ट कामगिरी केल्याने...\nउंड्री - पाचव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजूर ठार\nउंड्री - गुलाम अली नगर गल्ली नं 6 दि.13 ऑगस्ट दु.12.30 वाजता एका निर्माणाधीन इमारतीचे काम सुरू असताना पाचव्या मजल्यावर पडून राजशेखर माशाले (वय 33...\nपिंपळवंडीला मानव-बिबट सहजीवन जनजागृती\nजुन्नर - पिंपळवंडी ता.जुन्नर येथे मानव व बिबट संघर्ष व सहजीवन याविषयी मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती करण्यात आली. जुन्नर वन विभाग तसेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://nitinprakashan.com/blog/", "date_download": "2018-08-18T08:54:14Z", "digest": "sha1:52ZCXWI7ABC5DEFYA3TS2RLOYNTAJ3WT", "length": 6276, "nlines": 59, "source_domain": "nitinprakashan.com", "title": "Blog – Nitin Prakashan", "raw_content": "\nस्वतः अभ्यासाचे नियोजन करा आणि पाळा – शैलेश काळे\nमंजिल तो मिल जाएगी भटकते ही सही गुमराह तो वो है जो घरसे निकलेही नही गुमराह तो वो है जो घरसे निकलेही नही \nआव्हान स्वीकारले व यशाचा ध्यास घेतला – नीला सत्यनारायण\nमित्रमैत्रिणींनो, शाळा व महाविद्यालयामध्ये अतिशय हुशार विद्यार्थिनी म्हणून माझं नाव होतं. साहजिकच माझ्या शिक्षकांच्या व माझ्या आईवडिलांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. माझ्या वडिलांना फार वाटायचं की मी आय ए एस अधिकारी व्हावं. सहज गंमत म्हणून त्यांनी मला परीक्षेला बसायला सांगितलं. त्यावेळी खूपजणांनी मला सांगितलं, की तू परीक्षेला बसली आहेस, पण यशाची कुठलीच अपेक्षा ठेवू नकोस. कारण त्यावेळी या परीक्षेत मराठी विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचं प्रमाण फारच कमी होतं. पण आश्चर्य म्हणजे मी पहिल्या संधीतच लेखी व तोंडी परीक्षेत उत्तीर्ण झाले. इतकंच नाही तर गुणवत्ता यादीमध्ये माझं नाव झळकलं. वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी हे आव्हान स्वीकारलं आणि त्यात यशस्वी झाले. 1971...\nलोकसेवा स्पर्धा परीक्षेत सर्वात मोठी भीती मुलाखतीची असते. लेखी परीक्षा बरीच मुले पास होतात. आता सबंध राज्यभर कोचिंग क्लासेस आहेत. तेथे लेखी परीक्षेचे प्रशिक्षण दिले जाते. मात्र मुलाखत हा एक वेगळा अनुभव आहे.\nमराठी व्याकरणातील संकल्पना समजून घ्या\nस्पर्धा परीक्षांची तयारी करीत असताना आपण एक जबाबदार नागरिक असून कर्तव्य दक्ष अधिकारी बनण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहोत. आपली ही तयारी केवळ पाठांतर करून, घोकंपट्टीच्या आधारे नसावी, त्या त्या विषयाच्या संकल्पना नेमक्या समजून घेवून त्या प्रत्यक्ष कशा वापराव्यात याबद्दल आपला सर्वंकष अभ्यास व्हायला हवा.\nमुलाखतीची भीती हवी कशाला\nस्पर्धात्मक परीक्षेत मराठी तरुणांना यश मिळावे, यासाठी माजी सनदी अधिकारी नीला सत्यनारायण यांच्या पुढाकाराने ‘आरोही’ हा उपक्रम सुरु झाला आहे. स्पर्धात्मक परीक्षेतील पुढचा टप्पा असतो मुलाखतीचा. तिला सामोरे जाताना नेमके काय करायला हवे, हे सांगणारा हा लेख…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.manashakti.org/index.php?q=story/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE", "date_download": "2018-08-18T09:19:23Z", "digest": "sha1:BMNP5ANJASXSAM47VCH5ZZADYHZE5AKL", "length": 5093, "nlines": 91, "source_domain": "www.manashakti.org", "title": "वेदकाळचे दलित प्रेम | Manashakti Research Centre", "raw_content": "\nयेथे सातत्यपूर्ण मनःशांती मिळवण्याच्या सोप्या व व्यावहारीक उपायांची माहिती आहे.\nHome » Weekly Story » वेदकाळचे दलित प्रेम\nमेधातिथीचा चेहरा खर्रकन उतरला. समोर त्रिशोका उभा होता. कमरेवर हात ठेवून. विजयाने फुललेला. सार्थकतेनं संतुष्ट झालेला.\nजैमिनीय ब्राह्मणात दिलेली ही गोष्ट आहे.\nत्रिशोकाची आई हलक्या कुळातली आहे, असे काही अडाणी निंदक समजत. त्रिशोका हुषार होता. त्या काळात हुषारी गुणावरून ठरत असे, जन्मावरून नाही. पण तथाकथित उच्च जातीत, क्षुद्र मनाचेही लोक असतातच. त्यांच्या लेखी त्रिशोका हीन होता, तुच्छ होता. हलका होता. त्याचे मित्र चिडवीत, “तुझं नावसुध्दा तीनदा शोक करण्याच्या लायकीचे आहे. तू कसला दुर्देवी\nत्रिशोका वेदपारंगत होता, आणि स्वत:ला उच्च कुळातला समजणारा मेधातिथी, वेदापेक्षा भांडणातच तरबेज होता. त्याने त्रिशोकाची जन्महीनता काढली, तेव्हा त्रिशोका शांतपणे म्हणाला, “आपण निखाऱ्यावरून चालत जाऊ. मग तुला कळेल, की मीच मोठा आहे. “\nमेधातिथीने ते आव्हान पत्करले. छसरलेल्या निखाऱ्यावरून चालत गेलेला त्रिशोका पहिल्याच चटक्याला मागे हटलेल्या मेधातिथीकडे पाहात, ऐटीने उभा राहिला.\nरथस्पा नदीवरून पाण्याचा स्पर्शही न होता त्रिशोका जिंला. मेधातिथीने पुन्हा मेख मारली, “तू एवढा शूद्र आहेस की तुला पाणीसुध्दा स्पर्श करीत नाही, एवढाच त्याचा अर्थ. “\nमग मात्र त्रिशोकाने अखेरचे आव्हान फेकले. त्याने सुचविले की, सामरचना केल्यावर जास्त गाई कोणाकडे येतात ते पाहू.\nत्रिशोकाच्या लयबध्द, तेजस्वी सामरचनेने त्याच्याकडेच अधिक गाई धावून आल्या. मेधातिथीला बोलायला तोंडच उरले नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/february-17/", "date_download": "2018-08-18T09:15:23Z", "digest": "sha1:46TM5JXAUN54I243PFLLJ42MQP3IXOIQ", "length": 6062, "nlines": 147, "source_domain": "www.marathimati.net", "title": "१७ फेब्रुवारी दिनविशेष | February 17", "raw_content": "\nलो. टिळकांनी सैन्य भरतीला प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यात सभा भरवली\n१८३६- स्वामी रामकृष्ण परमहंस जयंती\n१८८८- परमाणू रचना व गुणधर्माचे अभ्यासक ’ऑटोस्टर्न’ यांचा जन्म\n१८७१- हिंदू धर्माचे पहिले मिशनरी विष्णूबुवा ब्रम्हचारी यांचे निधन\nक्रांतिकारक वासुदेव बळवंत फ़डके यांचा एडनच्या तुरुंगात मृत्यू\nप्रख्याट तत्ववेत्ते जे.कृष्णमूर्ती पुण्यतिथी\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in दिनविशेष and tagged जन्म, ठळक घटना, दिनविशेष, मृत्यू, १७ फेब्रुवारी on फेब्रुवारी 17, 2013 by प्रशासक.\n← १६ फेब्रुवारी दिनविशेष १८ फेब्रुवारी दिनविशेष →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://sanvaad.blogspot.com/2008/01/", "date_download": "2018-08-18T08:37:04Z", "digest": "sha1:ZFHHIRHBEIVVO3M5BGPGTGVGKCCNWBME", "length": 31978, "nlines": 167, "source_domain": "sanvaad.blogspot.com", "title": "संवाद: January 2008", "raw_content": "\nमाझ्या मनातला सातत्याने चाललेला विचारांचा प्रवास...माझ्यातल्या चाकोरीबाहेरच्या नव्या जाणिवा, नव्या सृजनाची जाण...त्याची अभिव्यक्ति म्हणजेच हा संवाद...मर्मबंधातली ठेव ही\nआजकाल मैत्रीला परिमाण तरी काय वापरतात आजकालच्या मैत्रीची व्याख्या मला नक्कीच समजत नसावी, याची आता मला खात्री वाटायला लागलीय....\nमैत्री म्हणजे नुसत एकमेकांशी गोड गोड बोलणं, एकमेकांच्या हो ला हो करणं बनलय का आपल्या मित्र मैत्रीणीच काही चुकत असेल तर त्यांना हे चुकतय अस सांगायचा अधिकार इतर मित्रांना नसतो का आजकाल आपल्या मित्र मैत्रीणीच काही चुकत असेल तर त्यांना हे चुकतय अस सांगायचा अधिकार इतर मित्रांना नसतो का आजकाल का, केवळ चूक झालेली व्यक्ती आपल्या मित्रगणात मोडते म्हणून चुकलेली कृती, बोलणं याच्याकडे डोळेझाक करायची का, केवळ चूक झालेली व्यक्ती आपल्या मित्रगणात मोडते म्हणून चुकलेली कृती, बोलणं याच्याकडे डोळेझाक करायची अस काही घडलच नाही अश्या थाटात हसत, बोलत अन वागत रहायच अस काही घडलच नाही अश्या थाटात हसत, बोलत अन वागत रहायचप्रसंगी कान पकडून चुकीची जाणीव आपल्या मित्राला करून द्यायाची मुभा आजकालच्या मैत्रीच्या व्याख्येत बसत नाही का\nप्रत्येकाशी मैत्री जमत नाही - निदान मला तरी नाही बहुतेक सर्वांशी हसून खेळून वागल तरी, मैत्रीचे धागे एखाद्याच व्यक्तीशी जुळतात, हो ना बहुतेक सर्वांशी हसून खेळून वागल तरी, मैत्रीचे धागे एखाद्याच व्यक्तीशी जुळतात, हो ना आणि हे अस लोभसवाणं मैत्र जुळलय हे समजल्यावर, आणि कालपरवापर्यंत ह्या मैत्रीविषयी अत्यंत आत्मीयता बाळगून असलेली व्यक्ती, मैत्री वार्‍यावर भिरकावून द्यायला तयार होते, नव्हे, भिरकावते - केवळ स्वतःचा 'मी' जपायला आणि हे अस लोभसवाणं मैत्र जुळलय हे समजल्यावर, आणि कालपरवापर्यंत ह्या मैत्रीविषयी अत्यंत आत्मीयता बाळगून असलेली व्यक्ती, मैत्री वार्‍यावर भिरकावून द्यायला तयार होते, नव्हे, भिरकावते - केवळ स्वतःचा 'मी' जपायला अस करू शकत का कोणी अस करू शकत का कोणी मैत्री अशी असते एक मित्र म्हणून, मी चूक दाखवून देणं मला इतक महागात पडणार आहे\nमाझा एक मित्र आहे, अगदी सवंगडी कॅटेगरीमधला, की आता 'होता' अस म्हणू :( आजपर्यंत आम्ही एकमेकांबरोबर खूप काही शेअर केलय, खूप गप्पा मारल्यात, खूप काही सांगितलय :( आजपर्यंत आम्ही एकमेकांबरोबर खूप काही शेअर केलय, खूप गप्पा मारल्यात, खूप काही सांगितलय आवडी निवडी, इच्छा, आकांक्षा, तत्वं सार सार काही. अगदी एखादी मुलगी ह्याच्या रडारवर रजिस्टर होते, तेह्वाही आधी मलाच कळत, निदान आजपर्यंत कळलय अस म्हणू आपण. खूप जवळचा मित्र. त्याच काही तरी सणसणीत चुकल, आणि ते त्याला मी जाणवून दिल, म्हणून त्याने माझ्याशी बोलणच टाकलय बरेच दिवस. त्याची चूक होती, जेव्हा त्याला तस लक्षात आणून दिलं तेव्हा त्याने ते मान्य केल, सॉरी म्हटल आणि मीही जाऊदेत रे, कळल ना तुला, म्हणत माझ्याकडून विषय संपवला. माझ्याकडून विषय संपला होता. संपायला पण हवा ना आवडी निवडी, इच्छा, आकांक्षा, तत्वं सार सार काही. अगदी एखादी मुलगी ह्याच्या रडारवर रजिस्टर होते, तेह्वाही आधी मलाच कळत, निदान आजपर्यंत कळलय अस म्हणू आपण. खूप जवळचा मित्र. त्याच काही तरी सणसणीत चुकल, आणि ते त्याला मी जाणवून दिल, म्हणून त्याने माझ्याशी बोलणच टाकलय बरेच दिवस. त्याची चूक होती, जेव्हा त्याला तस लक्षात आणून दिलं तेव्हा त्याने ते मान्य केल, सॉरी म्हटल आणि मीही जाऊदेत रे, कळल ना तुला, म्हणत माझ्याकडून विषय संपवला. माझ्याकडून विषय संपला होता. संपायला पण हवा ना अर्थात हे माझ मत.\nदुसर्‍या दिवसापासून हळू हळू लक्षात आल की हा पठ्ठ्या बोलतच नाहीये माझ्याशी अर्थात माझही चुकलच की जेह्वा लक्षात आलं तेह्वाच त्याला विचारायला हव होत की ही काय आता नवी नाटकं म्हणून.... पण तेह्वा मलाही राग आला होता.... असेच आता काही दिवस उलटलेत. काल शेवटी मीच विचारल त्याला, हे काय चाललय आणि अजून किती दिवस नाही बोलणार अस, म्हणून, तर म्हणे, मला माहीत नाही, बघू.....\nहे बरय म्हणजे... :( :( :( अशी असते का मैत्री काहीच वाटल नाही का याला अस वागताना काहीच वाटल नाही का याला अस वागताना आम्ही अजूनही बोलत नाही आहोत.....\nमेरे दोस्त किस्सा ये क्या हो गया,सुना हैं की तू बेवफा हो गया.......\nही मैत्री मी गमावली का कायमची\nआजकाल तसा मला खूप रिकामा वेळ असतो मंडळी आता निवृत्त माणूस मी आता निवृत्त माणूस मी आमची पुढची पिढी त्यांच्या आयुष्यात व्यस्त आहे, अन सहधर्मचारिणी आमची पुढची पिढी त्यांच्या आयुष्यात व्यस्त आहे, अन सहधर्मचारिणी त्यांच काय विचारता महाराजा त्यांच काय विचारता महाराजा इतक्या वर्षांत, हळूहळू, त्यांनी घरी आणि थोड्या फार प्रमाणात दारीही आपल साम्राज्य स्थापन केलय. त्या साम्राज्याची वीट हलवायच स्वप्न पहायची देखील माझी टाप नाही इतक्या वर्षांत, हळूहळू, त्यांनी घरी आणि थोड्या फार प्रमाणात दारीही आपल साम्राज्य स्थापन केलय. त्या साम्राज्याची वीट हलवायच स्वप्न पहायची देखील माझी टाप नाही होऽऽऽ आपणच कबूल करुन टाकलेल बर, नाही का आणि एका अर्थी ते साम्राज्य न हलवलेलच बर खर तर आणि एका अर्थी ते साम्राज्य न हलवलेलच बर खर तर हो, उगाच मोहोळावर दगड का मारायचा हो, उगाच मोहोळावर दगड का मारायचा काय, खर की नाही काय, खर की नाही\nतर, मी हा असा बसतो इथे बाल्कनीत खुर्ची टाकून काही बाही वाचतो, एखाद दुसर्‍या झाडाचं पान हालताना बघतो -आता एखाद दुसर्‍याच म्हणायच ना काही बाही वाचतो, एखाद दुसर्‍या झाडाचं पान हालताना बघतो -आता एखाद दुसर्‍याच म्हणायच ना झाडं राहिली आहेतच कुठे त्यांची पानं बघायला झाडं राहिली आहेतच कुठे त्यांची पानं बघायला - चालायचच. काळाचा महिमा म्हणायचं झाल - चालायचच. काळाचा महिमा म्हणायचं झाल पण शहराची रया गेलीय अगदी त्यामुळे, एवढ खर मात्र. वाईट वाटत अगदी. किती ओकबोकं झालय आता हे शहर.... कधी कधी वाटत बरका, जसजशी झाडं कमी होताहेत, तसतसा हा वातावरणातला जाणवणारा वाढता रखरखाट माणसांच्या मनातही उतरत चाललाय की काय नकळे... खूप खूप फरक पडलाय, हे मात्र खर.\nतर, मी आपला असा बसतो, काही बाही वाचन करतो, बाल्कनीमधून दिसणार आकाश पाहतो, रस्त्यावरची न थांबणारी गर्दी निरखतो, हिने दिलेले हुकूम पाळतो अन कधी कधी गेल्या दिवसांच्या आठवणींत बुडून जातो.....\nतसा आयुष्यात मी तृप्त आहे मंडळी फारशी तक्रार नाही. तसही बरका, आमच्या वेळी साधं सरळ आयुष्य होत, अन त्यामुळे जगणही खूप सोप होतं. आजकालच एकूणच चित्र पाहिल ना की कधी कधी वाटत, भाजी चार आण्याची अन मसाला रुपयाचा, अस काहीस आहे. म्हणजे प्रश्न असतो एवढासा, पण त्याला उगीच रुप मिळत ते हे एवढाल फारशी तक्रार नाही. तसही बरका, आमच्या वेळी साधं सरळ आयुष्य होत, अन त्यामुळे जगणही खूप सोप होतं. आजकालच एकूणच चित्र पाहिल ना की कधी कधी वाटत, भाजी चार आण्याची अन मसाला रुपयाचा, अस काहीस आहे. म्हणजे प्रश्न असतो एवढासा, पण त्याला उगीच रुप मिळत ते हे एवढाल काही उमगत नाही अश्या वेळी मात्र. असो.\nमी आपलं माझ्या अडाणी आज्जीने सांगितलेल साधं सोप्प तत्वज्ञान जगलो, अन भरून पावलो\nत्याच अस झाल, मी जेह्वा कॉलेजात गेलो की नाही, तेह्वाची गोष्ट एकदा, एका वर्गात, आमच्या प्रोफेसरांनी एक वाद विवाद स्पर्धा आयोजित केली. विषय काय एकदा, एका वर्गात, आमच्या प्रोफेसरांनी एक वाद विवाद स्पर्धा आयोजित केली. विषय काय तर 'प्याला अर्धा भरलाय का रिकामा तर 'प्याला अर्धा भरलाय का रिकामा' असा. प्रत्येकाने, एक तर प्याला भरलाय किंवा रिकामा आहे अशी एकच बाजू घेऊन ती मांडायची अन सिद्ध करायची. आता आली का पंचाईत' असा. प्रत्येकाने, एक तर प्याला भरलाय किंवा रिकामा आहे अशी एकच बाजू घेऊन ती मांडायची अन सिद्ध करायची. आता आली का पंचाईत दोन्ही एका परीने खरच की दोन्ही एका परीने खरच की सिद्ध तरी कस करणार सिद्ध तरी कस करणार आणि कोणत्याही अभ्यासाच्या पुस्तकातही याच उत्तर नव्हत हो आणि कोणत्याही अभ्यासाच्या पुस्तकातही याच उत्तर नव्हत हो मग आता काय करायच असा विचार करत आपला बसलो घरी येऊन......\n आधीच कालिजात जाणारा नातू, म्हणून तिला कौतुक. म्हणाली, \"काय रे, काय झालकसला विचार करतोस म्हणायच एवढाकसला विचार करतोस म्हणायच एवढा भूकबिक लागलेय का तुला भूकबिक लागलेय का तुला\nम्हटल, \"अग, भुकेच काय घेऊन बसलीस काय सांगू तुला, प्रोफेसर म्हणताहेत की वादविवाद करा, प्याला अर्धा भरलाय की अर्धा रिकामा आहे यावर काय सांगू तुला, प्रोफेसर म्हणताहेत की वादविवाद करा, प्याला अर्धा भरलाय की अर्धा रिकामा आहे यावर शोधा अन करा सिद्ध, अस म्हणताहेत ते शोधा अन करा सिद्ध, अस म्हणताहेत ते त्याचाच विचार करतोय ग... \"\n\" म्हणत, माझी आज्जी, आपल बोळक घेऊन मनमुराद हसली\nम्हटल \"अग, हसतेस काय अशी वादविवाद स्पर्धा आहे यावर वादविवाद स्पर्धा आहे यावर\nम्हणाली कशी, \"तुझ्या प्रोफेसरला उद्योग नाही की काय रे त्याला म्हणावे, आधी ह्याच उत्तर दे की पेल्यातल पेय पिताय का ओतून देताय त्याला म्हणावे, आधी ह्याच उत्तर दे की पेल्यातल पेय पिताय का ओतून देताय ते सांगा म्हणाव आधी ते सांगा म्हणाव आधीत्यावरन सांगतो म्हणाव की प्याला अर्धा भरलाय की रिकामा झालाय ते.....त्यावरन सांगतो म्हणाव की प्याला अर्धा भरलाय की रिकामा झालाय ते.....\nआता वाट्याला आलेला प्याला ओठी लावायचा की ओतून द्यायचा, हे आपणच ठरवायच, नाही का मंडळी\nनवीन वर्षाचा पहिला धक्का अन खरेदी\nसंथपणे नवीन वर्ष उलगडतय म्हणता म्हणता, गेल्या वीकांताला चांगलाच पचका झाला गेला आठवडा तसा शांतच गेला, म्हणजे ऑफिसमधे म्हणतेय मी गेला आठवडा तसा शांतच गेला, म्हणजे ऑफिसमधे म्हणतेय मी कुठलाही सर्वर मोडला नाही, कुठलही सॉफ्टवेअर मोडल नाही॥सगळ कस शांततापूर्ण. बर वाटल, कधी नाही ते जरा आराम केला. वर्षाची सुरुवात अशी सुखदायक पाहून अगदी धन्य झाले\nशनिवारी, इथेच राहणार्‍या मैत्रिणीचा फोन आला, घरी येतेस का रहायला म्हणून , आता हे दोघे नवरा बायको, माझे अगदी चांगले मित्र आहेत, आणि त्यांच पिल्लूही मला बिलगत आत्त्या, आत्त्या करत आणि मजाच असते यांच्याकडे जायच म्हणजे. खूप गप्पा, एकत्र केलेल जेवण, पाहिलेले सिनेमे, पिल्लूबरोबर केलेली धमाल, हसण, जुन्या आठवणी... तर आलेच, म्हणत धावलेच सगळी आवरा आवर करून त्यांच्या घरी. तसही आम्ही साधारण पंधरा एक मिनिटांच्याच अंतरावरच राहतो.मग काय, एकदा तिथे पोचल्यावर हसण, खाण, सिनेमे पाहण, पिल्लाची चिव चिव, सगळ मजेत नेहमीप्रमाणेच चाललेल. संध्याकाळी फिरायला गेलो, एकूण दिवस मजेत गेला. रविवार आणखीनच मस्तपैकी आळसात गेला, छान जेवलो, सुपारी चघळली, परत सिनेमा पाहिला, संध्याकाळी बाहेर जाऊन आलो, दोन्ही दिवशी गप्पा तर इतक्या केल्या की पुढच्या वीकांतापर्यंतची बेगमी झाली आणि मजाच असते यांच्याकडे जायच म्हणजे. खूप गप्पा, एकत्र केलेल जेवण, पाहिलेले सिनेमे, पिल्लूबरोबर केलेली धमाल, हसण, जुन्या आठवणी... तर आलेच, म्हणत धावलेच सगळी आवरा आवर करून त्यांच्या घरी. तसही आम्ही साधारण पंधरा एक मिनिटांच्याच अंतरावरच राहतो.मग काय, एकदा तिथे पोचल्यावर हसण, खाण, सिनेमे पाहण, पिल्लाची चिव चिव, सगळ मजेत नेहमीप्रमाणेच चाललेल. संध्याकाळी फिरायला गेलो, एकूण दिवस मजेत गेला. रविवार आणखीनच मस्तपैकी आळसात गेला, छान जेवलो, सुपारी चघळली, परत सिनेमा पाहिला, संध्याकाळी बाहेर जाऊन आलो, दोन्ही दिवशी गप्पा तर इतक्या केल्या की पुढच्या वीकांतापर्यंतची बेगमी झाली\nसोमवारी सकाळी घरी यायला निघाले, आणि घरी पोचल्यावर पर्समधे हात घातला तर किल्ली गायब\nसहसा मी किल्ली नेहमीच्या एकाच कप्प्यात ठेवते, पण न जाणो कुठे, इथे तिथे ठेवली असेल म्हणून अख्खी पर्स उलटपालट करून शोधल... किल्ली नव्हतीच तरी अजून सामानाची सॅक बाकी होतीच, ती देखील सामान काढून उलटी पालटी करुन पाहिल, त्यात पण नाही तरी अजून सामानाची सॅक बाकी होतीच, ती देखील सामान काढून उलटी पालटी करुन पाहिल, त्यात पण नाही आणि हे सगळ, फ्लॅटच्या दारासमोरच आणि हे सगळ, फ्लॅटच्या दारासमोरच दुसर काय ऑप्शनच नव्हत दुसर काय ऑप्शनच नव्हत तसाच परत मैत्रिणीच्या घरी फोन ठोकला, ती बिचारी पिल्लाला शाळेत पाठवायच्या तयारीत, तरी तिनेही शोधलेच घरी वेळात वेळ काढून तसाच परत मैत्रिणीच्या घरी फोन ठोकला, ती बिचारी पिल्लाला शाळेत पाठवायच्या तयारीत, तरी तिनेही शोधलेच घरी वेळात वेळ काढून तोपर्यन्त मी ही परत त्यांच्या घरी जाऊन धडकलेच होते. मी अन मित्र जोडप्याने विचारविनिमय करायचा निष्फळ प्रयत्न केला. त्यातून उत्पन्न काहीच झाले नाही तोपर्यन्त मी ही परत त्यांच्या घरी जाऊन धडकलेच होते. मी अन मित्र जोडप्याने विचारविनिमय करायचा निष्फळ प्रयत्न केला. त्यातून उत्पन्न काहीच झाले नाही शेवटचा उपाय म्हणून पिल्लूलाही विचारले, कारण साहेबांना सवय आहे वस्तू काढून तिच्याशी खेळायची अन आत्त्याची पर्स म्हणजे, त्यावर तर हक्कच ना शेवटचा उपाय म्हणून पिल्लूलाही विचारले, कारण साहेबांना सवय आहे वस्तू काढून तिच्याशी खेळायची अन आत्त्याची पर्स म्हणजे, त्यावर तर हक्कच ना :) आता आत्त्याच्या लॅपटॉपवर हक्क आहे, तर पर्सच काय एवढ मोठ्ठ :) आता आत्त्याच्या लॅपटॉपवर हक्क आहे, तर पर्सच काय एवढ मोठ्ठ :) :) पण एक मात्र आहे, समजा, एखादी वस्तू आमच्या या पिल्लाने घेतली असेल ना, आणि जर ती सापडत नसेल आणि जर पिल्लूला विचारल की तू घेतली होतीस का :) :) पण एक मात्र आहे, समजा, एखादी वस्तू आमच्या या पिल्लाने घेतली असेल ना, आणि जर ती सापडत नसेल आणि जर पिल्लूला विचारल की तू घेतली होतीस का तर आमच हे गोडूल सगळ सांगत, कधी घेतली, ती घेऊन काय काय खेळ केला, कुठे टाकली , घरातून बाहेर टाकली का, पुढच्या गॅलरीतून का मागच्या वगैरे, वगैरे तर आमच हे गोडूल सगळ सांगत, कधी घेतली, ती घेऊन काय काय खेळ केला, कुठे टाकली , घरातून बाहेर टाकली का, पुढच्या गॅलरीतून का मागच्या वगैरे, वगैरे आणि हे सगळ, अगदी निष्पाप चेहर्‍याने, मोठे मोठे भोकर डोळे करुन आणि चेहर्‍यावर एक गोडस, कशी जम्मत झाली, ह्या थाटातल हसू घेऊन आणि हे सगळ, अगदी निष्पाप चेहर्‍याने, मोठे मोठे भोकर डोळे करुन आणि चेहर्‍यावर एक गोडस, कशी जम्मत झाली, ह्या थाटातल हसू घेऊन तुम्हाला चिडायचा काही स्कोपच नाही तुम्हाला चिडायचा काही स्कोपच नाही तर पिल्लानेही मोठ्ठ नाऽऽऽऽही अस सांगून दिल\nत्यावर,त्याच्या बाबानेही लगेच तू किल्ली दिलीस ना, तर आत्त्या मोठ्ठ चॉकलेट देईल अस आमिष दाखवल (शोभतो की नाही बाबा एचआरचा पाईक) तरी उत्तर बदलायची तयारी नव्हती, त्यावरून तर स्पष्टच होत सगळ, पण थोड्या वेळातच एका चिमुकल डोक प्रकाशमान झाल आणि भरभर उत्तर यायला लागली\n... कुठाय चॉकलेट आत्त्या... \" परत एकदा थोड्या वेळाने, \" मी ना, मी ती बाथरूममधे ठेवेलीये बेसिन पाशी... आत्त्या, तू मला चॉकलेट देणारे का... \" परत एकदा थोड्या वेळाने, \" मी ना, मी ती बाथरूममधे ठेवेलीये बेसिन पाशी... आत्त्या, तू मला चॉकलेट देणारे का हो ना\" हे अगदी गोड आवाजात अन त्याहून खतर हसून दाखवून परत एकदा, आता शाळेत जाता जाता, \"आत्त्या, तुझी चावी हरवलीये का परत एकदा, आता शाळेत जाता जाता, \"आत्त्या, तुझी चावी हरवलीये का मग तू इथेच ये आता, मी नी, मी ती फेकून दिलीये बाल्कनीतन.. चॉकलेट आण हां.... टाटा मग तू इथेच ये आता, मी नी, मी ती फेकून दिलीये बाल्कनीतन.. चॉकलेट आण हां.... टाटा \" या सगळ्या गोंधळात बाबा मधून मधून निरर्थक वाक्य पेरत होता, \"अरे चॉकलेट फक्त चावी शोधून दिलीस तर..\" वगैरे, पण नसत्या गोष्टींकडे पिल्लू लक्ष देत नाही \" या सगळ्या गोंधळात बाबा मधून मधून निरर्थक वाक्य पेरत होता, \"अरे चॉकलेट फक्त चावी शोधून दिलीस तर..\" वगैरे, पण नसत्या गोष्टींकडे पिल्लू लक्ष देत नाही असो. पिल्लाच्या वागण्यान, थोडफार मनावरचा ताण हलका झाला होता खरा. मग परत एकदा किल्ली शोधून, ती न सापडताही, अस्मादिक सोमवार असल्यान, (आणि हापिसात सोमवारीच उपस्थिती नसल्यास बॉस ताताथैय्या करेल हे ओळखून) ऑफिसला रवाना झाले. कित्ती कर्तव्यपरायणता किनै असो. पिल्लाच्या वागण्यान, थोडफार मनावरचा ताण हलका झाला होता खरा. मग परत एकदा किल्ली शोधून, ती न सापडताही, अस्मादिक सोमवार असल्यान, (आणि हापिसात सोमवारीच उपस्थिती नसल्यास बॉस ताताथैय्या करेल हे ओळखून) ऑफिसला रवाना झाले. कित्ती कर्तव्यपरायणता किनै\nचेहर्‍यावर ताण दिसत असला पाहिजे, कारण कधी नाही ते बॉसने विचारल काय झालय, आणि कारण सांगितल्यावर, उद्या किल्ली नाही सापडली तर, सगळ कुलूप वगैरे बदलूनच ऑफसला ये, म्हणाला, उशीर झाला तरी चालेल, अशीही परवानगी दिली कित्ती ग तो माझा गुणाचा बॉस, अस म्हणावस वाटल अगदी कित्ती ग तो माझा गुणाचा बॉस, अस म्हणावस वाटल अगदी मग रात्री परत एकदा वरात मित्रघरी. हसत मुखान स्वागत झाल, पिल्लाची मिठी परत एकदा गळ्यात पडली, गप्पा, सिनेमा॥परत एकदा छानस हवस वाटणार रुटीन झाल. दुसर्‍या दिवशी मी अन मित्र जाऊन नव कुलूप, नवी किल्ली हे सगळे सोपस्कार करून आलो. हापिसात आल्यावर बॉसनेही सगळ सेफ आहे ना आता, अशी चौकशी केली. फणस आहे तो अगदी.\nशनिवारनंतर एकदम मंगळवारी रात्री ऑफिसमधून गेल्यावर घरात परत पाऊल ठेवल रात्री घरी पोचले नाही तोच पिल्लाचा फोन आला, \"आत्त्या, तू का गेली घरी रात्री घरी पोचले नाही तोच पिल्लाचा फोन आला, \"आत्त्या, तू का गेली घरी आली का नाही\" ह्या पिल्लाच्या प्रेमात पडण एकदम सोप्प आहे :) नव्या किल्लीची एक आवृत्ती मित्रघरी पण आहे आता\nअसो. परत एकदा नवी किल्ली आणि जुन घर अस नव्या वर्षात रुटीन सुरु झालय. आणि, नवीन वर्षाची हीच ती माझी अक्कलखाती जमा केलेली नवी खरेदीही \nअसच, मनातल काही बाही....\nबघता बघता, २००७ संपल आणि २००८ उजाडून दुसरा दिवस पण संपत आलाय :) काल दिवसाची सुरुवात सही झाली सुट्टी होती, त्यामुळे एकदम आराम केला सुट्टी होती, त्यामुळे एकदम आराम केला सध्ध्या इतक घड्याळाच्या तालावर नाचाव लागत ना, की अर्धा दिवस जरी सुट्टी मिळाली तरी मस्त वाटत सध्ध्या इतक घड्याळाच्या तालावर नाचाव लागत ना, की अर्धा दिवस जरी सुट्टी मिळाली तरी मस्त वाटत :) आजपासून परत एकदा रुटीन सुरु झालय, पण सगळे अजून तसे सुट्टीच्याच मूडमधे आहेत, त्यामुळे तसा आरामच आहे.\nतस काही संकल्प वगैरे या वेळी केले नाहीत, कारण, असे काही संकल्प केले की पहिल्याच आठवड्यात त्यांची वाट लागते, हे ठरलेल पण काही काही गोष्टी करायला खूप आवडतील, जस की टॅक्सच्या बाबतीत पहिल्यापासून व्यवस्थित सगळ्या नोंदी ठेवण, म्हणजे आयत्यावेळी धावपळ टाळता येईल. :D समोरच्याला नाही म्हणायला शिकण, कधी कधी हे नाही म्हणणं खूप कठीण होत, पण ते आवश्यक ही असतच. वाचन परत एकदा वाढवण.... आजकाल, वाचन खूप कमी झालय :(. कामाच्यापलिकडे जाऊन थोडा वेळ स्वतःचा, फक्त स्वतःचा म्हणून बाजूला ठेवण, परत एकदा फोटोग्राफीकडे वळण... मारूतीच्या शेपटासारखी यादी आहे... चांगले सिनेमा पाहण, गाणी ऐकण, हे न ते, कितीतरी गोष्टी करायला आवडतील......\nयात पुन्हा नवीन वर्षाच्या पोतडीत माझ्यासाठी अन माझ्या अवतीभवतीच्यां लाडक्या लोकांसाठी काय आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता आहेच, कारण आपण खूप काही ठरवल, तरी केवळ तेवढच पुरेस नसत आणि माझ्या सभोवतालच्या लाडक्यांच्या आयुष्यात काय घडत, त्याचे बरे वाईट परिणाम माझ्यावरही होतातच ना आणि माझ्या सभोवतालच्या लाडक्यांच्या आयुष्यात काय घडत, त्याचे बरे वाईट परिणाम माझ्यावरही होतातच ना\nअजून तरी, वर्ष संथ गतीने उलगडतय, तेह्वा, मीही तसच त्याच लयीत सध्ध्या नवीन वर्षाच स्वागत करायच ठरवलय, आगे आगे देखेंगे होता है क्या..... :) आणि आत्ता हे... एका सहकार्‍याच लग्न ठरतय आणि बाकीचे त्याला २९ फेब्रुवारीला लग्न करायचा सल्ला देताहेत ४ वर्षातून एकदाच लग्नाचा वाढदिवस साजरा करावा लागेल म्हणे ४ वर्षातून एकदाच लग्नाचा वाढदिवस साजरा करावा लागेल म्हणे\nनवीन वर्षाचा पहिला धक्का अन खरेदी\nअसच, मनातल काही बाही....\nमाझिया मना जरा सांग ना\nप्रतिबिंब - आणि हा ब्लॉग बघणीय पण :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://blog.railyatri.in/oldest-ganpati-mandals-of-mumbai-marathi/", "date_download": "2018-08-18T08:26:09Z", "digest": "sha1:YPDMFYNXBZITY2U7BWEGG37BV4A6ACDO", "length": 9271, "nlines": 100, "source_domain": "blog.railyatri.in", "title": "मुंबईतील सर्वात जुने गणपती मंडळ -", "raw_content": "\nमुंबईतील सर्वात जुने गणपती मंडळ\nमुंबईतील सर्वात जुने गणपती मंडळ\n हा मंत्र महाराष्ट्रातील अनेक हृदयांमध्ये आनंदीआनंद भारून टाकतो. गणपती पूजेच्या परंपरांचा मनःपूर्वक आनंद लुटावयाचा असल्यास, तुम्हाला या शहरातील सांस्कृतिक पूजा मंडळांना भेट द्यावी लागेल. मुंबईतील सर्वात जुन्या पूजा मंडळांची आम्ही येथे यादी देत आहोत.\nकेशवजी नाईक चाळ, गिरगाव – 125 वर्षे\nही शहरातील सर्वात पहिली सार्वजनिक गणपती पूजा होती, जी 1893 मध्ये सुरु झाली होती. हे मंडळ त्याच्या पर्यावरण-अनुकूल उत्सवासाठी आणि लहान गणेश मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. लाउडस्पीकर, ढोल-ताशाविनाची ही पूजा एक पारंपारिक प्रथा येथे दिसून येते. मागील 4 पिढ्यांपासून एकाच कुटुंब यथील मुर्त्या बनवित आले आहे. येथील आयोजन समिती नियमितपणे भजन कार्यक्रम, मुलांसाठी स्पर्धांचे आयोजन करीत आले आहे. या मंडळाला भेट देण्यासाठी सर्वात व्यस्त कालावधी म्हणजे सकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंतचा असतो.\nनजीकचे रेल्वे स्थानक: चर्नी रोड\nचिंचपोकळी चिंतामणी, चिंचपोकळी – 98 वर्षे\nचिंचपोकळी चिंतामणी (चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ) 1920 मध्ये स्थापित झाले होते, आणि ते मुंबईतील दुसरे सर्वात गुणे गणेशोत्सव मंडळ आहे. येथील पूजा समिती गरीब आणि गरजूंना मदत करण्याबरोबरच, रक्तदान आणि नेत्रदान शिबिरांसारख्या अनेक सामाजिक कल्याण उपक्रमांसाठी समर्पित आहे. हे मुंबईतील एक सर्वाधिक विश्वसनीय आणि शिस्तबद्ध मंडळ म्हणून प्रसिद्ध आहे.\nनजीकचे रेल्वे स्थानक: चिंचपोकळी\nमुंबईचा राजा, गणेश गल्ली – 90 वर्षे\nपेरू चाळच्या सभोवती राहणाऱ्या युवांनी 1928 मध्ये “लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ” सुरु केला होता. लोकमान्य टिळकांनी या सामाईक मंचाद्वारा सामान्य जनतेस एकत्र आणण्याच्या आणि त्यांच्यात स्वातंत्र्य लढ्याची ज्योत पेटवण्याच्या विचारांनी हा उत्सव सुरु केला होता. हा उद्देश ध्यानात ठेवूनच, 1945 मधील काही लालबाग सार्वजनिक मंडळाच्या मुर्त्यांनी सुभाष चंद्र बोस सात घोड्यांवर स्वार झाल्याचे प्रस्तुत केले होते.\nनजीकचे रेल्वे स्थानक: चिंचपोकळी\nलालबागचा राजा, लालबाग – 84 वर्षे\nमुंबईतील एक सर्वात प्रसिद्ध आणि सर्वाधिक गर्दी खेचणारे असे सार्वजनिक गणपती मंडळ आहे, लालबागचा राजा. मूर्ती 11 दिवसांसाठी सार्वजनिक दर्शनासाठी ठेवली जाते, आणि त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या पवित्र दिवशी याचे विसर्जन करण्यात येते. येथे दोन रांगा असतात- नवसाची रांग आणि मुख दर्शनाची रांग. नवसाची रांग ही अशा लोकांसाठी असते, ज्यांना त्यांच्या इच्छा पूर्ण करून घ्यावयाच्या असतात. या रांगेत तुम्ही त्या मंचापर्यंत जाऊन लालबागच्या राजाच्या चरणांना स्पर्श करू शकता. दुसरी रांग मुख दर्शनासाठी बनविलेली असते. म्हणजेच, मंचाकडे न जाता तुम्हाला केवळ मूर्तीचे दर्शन होते.\nनजीकचे रेल्वे स्थानक: करी रोड\nPrevious Postकाही अपरिचित आरएससी तिकिटांच्या नियमांवर एक नजर Next Postअस्सल महाराष्ट्रीयन थालीसाठी मुंबईत कुठे जायचे\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nसामान नेण्याचे नवे नियम\nट्रँक्वेबारच्या डॅनिश शहरावर ओझरती नजर\nरेलयात्री बस सेवा उत्तम का आहे\nप्रवासात खाण्यासाठी आरोग्यदायी सूचना\nया उन्हाळ्यात तुम्हाला व्यस्त ठेवण्यासाठी मजेदार उपक्रमे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/gossips/guess-who-is-prarthanas-hero", "date_download": "2018-08-18T08:19:21Z", "digest": "sha1:FEX45FTQVEY4LA7GXC5BN6IIIPUFIHNR", "length": 3901, "nlines": 53, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Guess... who is Prarthana’s Hero? | Marathi Dhamaal", "raw_content": "\nअभिनेत्री प्रार्थना बेहरे कोणासोबत दिसते, कोणाच्या आड लपलीय, हा कोण आहे, .असे असंख्य प्रश्न हे पोस्टर पाहून पडत आहेत. अजून तरी या हिरोचाचेहरा दिसत नसला तरी प्रार्थनाच्या आगामी सिनेमाचा हा फर्स्ट लूक आहे. पण सिनेमाच्या नावासोबतच या डॅशिंग हिरोचं नावसुध्दा गुलदस्त्यातच ठेवण्यात आलंय. लवकरच सिनेमाचा नायक आणि सिनेमाचं नाव उघड होण्याची सर्वत्र उत्सुकता आहे.\nतुम्हाला हे वाचायला आवडेल \n‘चला हवा येऊ द्या’ का घेतायेत विश्रांती...\n'गच्ची' वर झाला होता गंभीर अपघात\nहि मराठी अभिनेत्री लवकरच करतेय लग्न...\nअमृताला कोणी लिहिल पत्र...\nबघा शनायाने आयुष्यात पहिल्यांदा काय घेतला विकत\nसुबोध भावे करणार प्राजक्ता माळीसोबत स्क्रिन शेअर\n‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित मराठी चित्रपटाची निर्मिती करणार\n लाफ्टर क्वीन प्राजक्ता हनमघरचे झाले शुभमंगल\nइरफान खान आणि डलक्यूअर सलमान यांच्यासोबत झळकणार मिथिला पालकर\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\n शिवानी–शिवराज काय करत आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/225/Wajavi-Murli-Shamasundara.php", "date_download": "2018-08-18T08:37:31Z", "digest": "sha1:6QIDT465S7RVJF3DUYCAPR35ETHCSJI5", "length": 11119, "nlines": 143, "source_domain": "www.gadima.com", "title": "Wajavi Murli Shamasundara -: वाजवि मुरली श्यामसुंदरा : BhaktiGeete (Ga.Di.Madgulkar|Manik Varma|) | Marathi Song", "raw_content": "\nउचललेस तू मीठ मुठभर,साम्राज्याचा खचला पाया\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nतुझ्या मंदिरी नाचे मीरा \nकरि करताळा, पायी घुंगुर\nजन्म तुडविते हा क्षणभंगुर\nदेह नव्हे हा मोरपिसारा \nगोपिनाथ तू, मी तर गोपी\nपुण्यशील तुज, जगास पापी\nआले आले मी अभिसारा \nमहाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.\nतुझे रूप चित्ती राहो\nएकवार पंखावरुनी फिरो तुझा हात\nधाव पाव सावळे विठाई\nविठ्ठला तू वेडा कुंभार\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/3d-pelvic-floor-imaging/", "date_download": "2018-08-18T07:59:26Z", "digest": "sha1:RFAQG4KSFARPFC4PDOEVFLORVUEMS27Y", "length": 8138, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जाणून घ्या! थ्रीडी पेल्विक फ्लोर इमेजिंगबद्दल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n थ्रीडी पेल्विक फ्लोर इमेजिंगबद्दल\nपुण्यामध्ये आता थ्रीडी पेल्विक फ्लोर इमेजिंगची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे एमआरआयचा वापर न करताच कॉम्प्लेक्‍स फिस्तुला यासारख्या गुंतागुंतीच्या आजारांचे अचूक आणि कमी वेळेत निदान करणे आता शक्‍य झाले आहे.\nजगभरात काही निवडक ठिकाणीच ही सुविधा उपलब्ध आहे. रेक्‍टल कॅन्सरचे अचूक निदान आणि शस्त्रक्रियेसाठी आवश्‍यक असलेल्या रुग्णाच्या शरीराच्या विशिष्ट भागाच्या स्पष्ट प्रतिमा मिळविण्यासाठी थ्री-डी पेल्विक फ्लोर इमेजिंगचा फायदा होतो.\nजगभरातील निवडक ठिकाणीच अशी सुविधा उपलब्ध आहे. सुमारे 20 ते 30 टक्के रुग्णांना एमआरआय करताना भीती वाटत असते. अशा रुग्णांच्या आजाराच्या निदानासाठी, स्क्रीनिंगसाठी तसेच डेफेकोग्राफीसाठी ही सुविधा उपयुक्‍त आहे. थ्रीडी पेल्विक फ्लोर इमेजिंग सुविधा ही रुग्णांच्या दृष्टीने अत्यंत सोयीची आहे. त्यासाठी फक्त 15 मिनिटांचा वेळ लागतो.\nकॉम्प्लेक्‍स फिस्तुला, स्फिंक्‍टर डिफेक्‍टचे निदान, रेक्‍टल कॅन्सरचे निदान, इन्कॉन्टिनंसची शस्त्रक्रिया, फिस्तुला रिपेअर आणि सातत्याने होणाऱ्या बद्धकोष्ठतेच्या निदानासाठी थ्रीडी पेल्विक फ्लोर इमेजिंगचा वापर केला जातो.\nनव्याने विकसित केलेल्या डीएलपीएल तंत्रज्ञान पुण्यामध्ये आल्याने यापूर्वीही अत्याधुनिक व नावीन्यपूर्ण उपचार, शस्त्रक्रियांचा फायदा रुग्णांना झाला आहे. मूळव्याध व बद्धकोष्ठतेसाठी एमसीडीपीए, वारंवार होणाऱ्या बद्धकोष्ठतेसाठी बायोफिडबॅक तसेच डिटॉक्‍स व कोलोन क्‍लिन्सिंगसाठी कोलोन हायड्रोथेरपीची सुविधाही आता पुण्यात उपलब्ध आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबाळाच्या नाजूक त्वचेसाठी वापरा ‘कोरफड’\nNext articleउत्तर प्रदेशमध्ये पावसाने घेतला 14 जणांचा बळी\n वाचा, कसा कराल वापर…\nकुबडेपणावर करा मात… (भाग-२)\nगर्भवती स्त्रीने आरोग्य व सौंदर्याबाबत ‘अशा’ प्रकारे घ्यावी काळजी\nकुबडेपणावर करा मात… (भाग-१)\nछातीत दुखत असेल तर दुर्लक्ष नको (भाग २)\nमेंदूतील रक्तवाहिन्यांचे आजार (भाग १)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/harinamani-alankapuri-dumdumali-the-city-witnessed-the-celebration-of-maulis-palkhi-festival/", "date_download": "2018-08-18T07:59:28Z", "digest": "sha1:JDUK3XKJE5XCUNCQ5VCBMUQCXLUD2XMR", "length": 10401, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हरिनामाने अलंकापुरी दुमदुमली ; नगरप्रदक्षिणेने माऊलींच्या पालखी सोहळ्याची सांगता | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nहरिनामाने अलंकापुरी दुमदुमली ; नगरप्रदक्षिणेने माऊलींच्या पालखी सोहळ्याची सांगता\nइंद्रायणीचा घाट पुन्हा फुलला\nआळंदी: आळंदीतून 6 जुलै रोजी माऊलींच्या पालखीने पंढरपूकडे प्रस्थान ठेवले होते, त्यानंतर पांडुरंगाचे दर्शन घेऊन पालखी सोहळा मंगळवारी (दि. 7) आळंदीत दाखल झाल्यानंतर आज (बुधवारी) नगरप्रदक्षिणेने सोहळ्याची सांगता झाली. दरम्यान, सांगता सोहळ्यानिमित्त आज राज्य परिसरातून आलेल्या लाखो भाविकांनी स्नानासाठी इंद्रायणी नदीच्या दोन्ही घाटावर गर्दी केली होती.\nमंदिरातील नवीन दर्शन मंडपबारी आज सकाळपासूनच भक्‍तांची गर्दी झाल्याने केवळ आषाढी व कार्तिकी यात्रेत दर्शनबारीसाठी वापरात येणारा भक्‍ती-सोपान पुलावर देखील भाविकांच्या रांगा लागलेल्या होत्या. दरम्यान, पहाटे तीनपासून माऊली मंदिरातील नित्याचे धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर श्रींना नैवेद्य देण्यात आला व दुपारी 12.30 वाजता ज्ञानोबा-तुकोबांचा गजर करीत टाळ-मृदंगाच्या निनादात हजारो वैष्णवांसमवेत श्रींची पालखी नगरप्रदक्षिणे करीता हजेरी मारूती मंदिराकडे निघाली. प्रथापरंपरेप्रमाणे हजेरी मारूती मंदिरात पालखी विसावताच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यानंतर किर्तन सेवा होऊन पालखी सोहळ्यात सहभागी झालेले दिंडीकरी, मानकरी, टाळकरी, चोपदार, मालक आदींचा देवस्थानांचे वतीने नारळ-प्रसाद वाटप करून सन्मान करण्यात आला. त्यानंतर पालखी सोहळ्याची सांगता होऊन पालखी माऊली मंदिरात विसावली.\nदरम्यान, दर महिन्याच्या एकादशीला माऊली मंदिरात भाविकांच्या मोफत आरोग्य सुविधेसाठी पिंपरी येथील डि. वाय. पाटील ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या मोफत आरोग्य तपासणीसह औषध गोळ्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सुनिता पाटसकर, अन्नु भारद्वाज, रवींद्र येळवंडे, कृष्णा भारद्वाज व प्रमुख व्यवस्थापक माऊली वीर आदी उपस्थित होते.\nनो पार्किंमध्येही बिनदिक्कत दुचाकी पार्क\nमाऊली मंदिराकडे जाणाऱ्या चारही रस्त्यावर बॅरिगेट लावले नसल्याने चारचाकी, दुचाकी वाहने व निरनिराळ्या व्यावसायिकांनी जागा व्यापल्याने भाविकांना दिवसभर अडथळ्यांच्या शर्यतीचा सामना करावा लागत होता. तर भराव रस्ता (पितळी गणपती मंदिराजवळ) परिसरात सर्रासपणे दुचाकी लावण्यात आल्या होत्या. तसेच महाद्वारात नो पार्किंग झोन असताना बिनदिक्‍तपणे दुचाकी लावण्यात आल्याने भाविकांना अडथळ्यांची शर्यत पार करीत मंदिरात प्रवेश करावा लागल्याने भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. दरम्यान, शहरातील रस्त्यावर वाहतूककोंडी झाल्याने प्रवशांचे हाल झाले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआणखी बुडित कर्जे बाहेर येणार\nNext articleVideo : पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना मिळाली सुट्टी \nरिक्षाचालकांचे प्रश्‍न मार्गी लावणार -पालकमंत्री गिरीश बापट\nकारागृहातील कैद्यांना विशेष माफी मिळणार ; केंद्र सरकारचा निर्णय \nबारामतीत पहिले पाढे पंच्चावन्न \nखासदार सुळेंनी धरला झिम्मा फुगड्यांचा फेर\nमातृभाषांची जपणूक करणे प्रत्येकाचे कर्तव्य- राज्यपाल सी. विद्यासागर राव\nदुर्मीळ वृक्षांची अनोखी दिंडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://m4marathi.com/v2/category/health-tips-in-marathi/home-made-health-tips/", "date_download": "2018-08-18T09:06:38Z", "digest": "sha1:OP65V4L3DIZN5O2B7JIH2JHFHJ42SR2G", "length": 7641, "nlines": 99, "source_domain": "m4marathi.com", "title": "घरचा वैद्य | m4marathi", "raw_content": "\nमोसंबी हे अत्यंत गुणकारी फळ आहे. मोसंबीत ए, बी, सी ही जीवनसत्त्वे आढळतात. विशेषत: मुलांसाठी मोसंबी फायदेशीर आहे. मोसंबी सौंदर्यवर्धक आहे. मोसंबीच्या रसाने शरीराला शीतलता प्राप्त होते. मोसंबी\nटरबुजची अत्यंत गुणकारी औषध म्हणून देखील या फळाची ओळख आहे. हृदयासाठी उपयुक्त ठरण्यासोबतच वियाग्राचे काही गुणसत्व देखील यामध्ये आहेत. शिवाय टरबुजाच्या बियांमध्ये देखील विविध गुणधर्म असल्याने शरिरासाठी अत्यंत\nहळद हा मसाल्याच्या डब्यातला महत्त्वाचा पदार्थ. हळदीतले औषधी गुण सर्वश्रुत आहेत. म्हणूनच भारतीय संस्कृतीत सणवारी अथवा मंगल कार्यामध्ये हळदीला महत्त्वाचं स्थान आहे. आपल्याप्रमाणे जगाच्या विविध भागात मोठय़ा प्रमाणात\nनिलगिरीचे वनस्पतीपासून सुगंधी द्रव्योद्योग तेले, औद्योगिक तेले, औषधी तेले तयार केली जातात. संधिवातावर निलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन चोळतात. भाजल्याने त्वचेला इजा होते, अशा वेळी निलगिरी\nगूळ हा चवीला गोड असल्यामुळे तो सर्वांनाच खायला आवडतो व प्रत्येकाच्याच घरात असतो. याचे फायदे व तोटे खूप कमी लोकांना माहीत असतात. १.गूळ हा उष्ण असतो. त्यामुळे गर्भवती\nकोकणात आंब्यानंतर सगळय़ात जास्त मागणी असणारे फळ म्हणजे फणस.. फणस खाण्यास अतिशय गोड असले, तरी आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठीही फणस उपयुक्त फळ आहे. फणसला बाहेरून काटे असले तरी\nवेलदोडे आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. वेलदोडेला वेलची किवा इलायची असेही म्हणतात. वेलदोडा साधारणपणे गोड खाद्यपदार्थांमध्ये वापरतात. विड्याच्या पानातही वेलदोडा टाकतात. याशिवाय मसालेभात, पुलाव, बिर्याणी यांत वेलदोड्याचा बडी इलायची हा\nकाजूचे खूप लाभकारी आहे . थोडेसे काजू खाल्ल्यास शरीराला केवळ ऊर्जाच मिळत नाही तर विविध आजारसुद्धा दूर होतात. १.काजूमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असतात. २.काजू पचण्यास हलके असतात. ३.काजूमध्ये\nअंजीर शक्तिवर्धक असून पचनास जड पण शीतदायी आहे. सुक्या अंजिरामधील लोहामुळे आपले शरीर आणि जठर क्रियाशील बनते, परिणामत: भूक लागते. अंजीर पित्तविकार, वायुविकार आणि रक्तविकार दूर करते. अंजिराच्या\nअद्रक (आले) ही औषधी वनस्पती मानली जाती. आल्यापासून आपल्याला नियमित दिनचर्येमध्ये खूप फायदे होतात. आले सेवनामुळे आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढते. तर चला पाहूया या आल्याचे आपण किती फायदे करून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-metro-pune-77872", "date_download": "2018-08-18T08:29:30Z", "digest": "sha1:656DAOWT6DD756UDUBJYWB37GMYK7EQS", "length": 13799, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news metro pune भूमिगत मेट्रो स्थानकाचा आराखडा तयार | eSakal", "raw_content": "\nभूमिगत मेट्रो स्थानकाचा आराखडा तयार\nबुधवार, 18 ऑक्टोबर 2017\nपुणे - जेधे चौकातील भूमिगत मेट्रो स्थानकाचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया महामेट्रोने सुरू केली आहे. स्थानकाचा प्राथमिक आराखडा तयार झाला असून येत्या दोन महिन्यांत अंतिम आराखडा तयार होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nपुणे - जेधे चौकातील भूमिगत मेट्रो स्थानकाचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया महामेट्रोने सुरू केली आहे. स्थानकाचा प्राथमिक आराखडा तयार झाला असून येत्या दोन महिन्यांत अंतिम आराखडा तयार होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nपिंपरी-स्वारगेट मार्गावरील भूमिगत मेट्रो स्थानक जेधे चौकात होणार आहे. त्यासाठी महामेट्रोने 3 हेक्‍टर जागा महापालिकेकडे मागितली आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. पीएमपी आणि एसटी महामंडळालाही त्यात सामावून घेतले जाणार आहे. जमिनीच्या 23 ते 28 मीटर खाली महामेट्रोचे स्थानक असेल. जेधे चौकातील भूमिगत स्थानकाचा आराखडा सहा महिन्यांत तयार करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्यानुसार प्राथमिक आराखडा तयार झाला आहे. त्या आधारे आता अंतिम आराखडा तयार होणार आहे, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांनी दिली.\nभूमिगत मेट्रो स्थानकात प्रवेशासाठी किमान चार जिने पादचाऱ्यांसाठी असतील. त्यातील दोन जिने सरकते असू शकतील. तसेच एसटी महामंडळ आणि पीएमपीच्या बस स्थानकापर्यंत येऊ शकतील का, या बाबतचाही विचार केला जात आहे. त्यामुळे प्रवाशांना स्थानकाबाहेर न येता तेथेच बस अथवा एसटी उपलब्ध होऊ शकेल. किमान पीएमपीची बससेवा तरी तेथे उपलब्ध व्हावी, असा प्रयत्न आहे. स्थानकाचा आराखडा तयार करण्यासाठी वाहतुकीचे सर्वेक्षणही तातडीने सुरू होणार आहे. कोणत्या दिशेने किती वाहतूक येते, याचा अंदाज घेऊन काम सुरू झाल्यावर वाहतुकीचा आराखडा निश्‍चित होईल, असेही महामेट्रोच्या सूत्रांनी स्पष्ट केले. भूमिगत स्थानकाबाबत एसटी महामंडळ आणि पीएमपीशी संपर्क साधला असून त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.\nस्वारगेट उड्डाण पुलावरून दुतर्फा वाहतूक\nभूमिगत स्थानकाचे काम सुरू झाल्यावर जेधे चौकातील वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होऊ शकते. त्यासाठी सक्षम वाहतूक आराखडा तयार करण्याबाबत सध्या अभ्यास सुरू आहे. त्याअंतर्गत जेधे चौकातील उड्डाण पुलावरून दुतर्फा वाहतूक सुरू करता येईल का, याचाही विचार करण्यात येत आहे. गरज पडली तर, या पर्यायाचीही अंमलबजावणी होऊ शकते, असे महामेट्रोच्या सूत्रांनी स्पष्ट केले.\nपंतप्रधानांकडून केरळसाठी 500 कोटींची मदत जाहीर\nतिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल...\nपंतप्रधान मोदी केरळमध्ये दाखल ; पुरपरिस्थितीचा आढावा घेणार\nतिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरात आत्तापर्यंत 300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर कोट्यवधींचे...\nआदित्यमुळे राज्यभरातील दिव्यांगांना न्याय\nनागपूर : केंद्राने कायदा संमत करून राज्याने त्याची अंमलबजावणी केली नाही. याचा फटका राज्यातील दोन टक्के दिव्यांगांना दोन वर्षे बसला. रामटेकमधील आदित्य...\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nनवी दिल्ली : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (वय 93) यांचे काल (गुरुवार) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर...\nकेरळमधील पुरात 174 जणांचा मृत्यू\nतिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. जोरदार पावसामुळे आलेल्या पुरात आत्तापर्यंत सुमारे 174 जणांचा मृत्यू झाला. तर 8...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/mahakumbh-marathi/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5-113011400004_1.htm", "date_download": "2018-08-18T09:11:32Z", "digest": "sha1:JSNK5W4KL2ZNTHZJLBI7H23XBSDMLHFB", "length": 16453, "nlines": 145, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Kumbh Mela 2013 Allahabad | कुंभमेळ्यात अन्नदानाला महत्त्व | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकुंभंमेळा भरतो त्या ‍ति‍र्थक्षेत्रावर अन्नदान व तिळदानाचे खूप महत्त्व आहे. येथे थोडेही दान केले तरी मनाप्रमाणे फळ मिळत असते, अशी भाविकांची धारणा आहे. तसेच माघ मासात अन्नदानाचे विशेष महत्त्व असल्याचे पुराणात सांगितले आहे. अन्न हा केवळ शरीराच नाही तर आपल्या जीवनाचा आधार असून अन्नदान हे प्राणदानासमान आहे. इतर दानधर्माच्या तुलने अन्नदानाला अन्यंन साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.\n'कुंभमेळा' हा वेदकाळापासून प्रचलित आहे, असे मानले जाते. समुद्रमंथनातून जे अमृत बाहेर निघाले होते. त्याचे चार थेंब त्र्यंबकेश्वर, उज्जैन, प्रयाग, हरिद्वार या चार तीर्थक्षेत्रावर पडल्याने येथे कुंभमेळा भरतो. कुंभमेळ्याला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. सिंह राशीत गुरु प्रवेश करतो तेव्हा सिंहस्थ आणि कुंभ राशीत गुरु म्हणजे कुंभमेळा असे म्हटले जाते.\nमाघ महिन्यात 14 जानेवारीला मकरसंक्रांतीपासून हरिद्वार येथे गंगेच्या काठावर कुंभमेळा भरला आहे. तेथे लाखो लोक लावत असतात. माघ महिन्याला पुण्य मास असे ही‍ म्हटले जाते. शुक्ल पक्षात उत्तम मुहूर्त पाहून ब्राह्मण भोजन देण्याचे महत्त्व आहे. एक हजार ब्राह्मणांना भोजन देण्‍याचे पुराणात म्हटले आहे. मात्र आपल्या यथाशक्तीप्रमाणेही केल्याने त्याचे पुण्य मिळत असते. भोजनपूर्व ब्राह्मणांनी स्वस्तिवाचन केले पाहिजे. सोन्याच्या अथवा तांब्याच्या कळस ठेवून विष्णुची प्रतिमेची स्थापना केली पाहिजे. त्यानंतर ब्राह्मण भोजन देऊन त्यांना दान- दक्षिणा दिली पाहिजे.\nअन्नदान केल्यानंतर आचार्य यांना वासरूसह काळी गाय व इतर ब्राह्मणांना बैल अथवा घोडा देण्याची प्रथा आहे. तसेच अन्न हे पूर्णब्रह्म असल्याने ते वाया जाता कामा नये. त्यामुळे शिल्लक राहिलेले अन्न दीन दुबळ्यांना वाटून द्यावे.\nब्राह्मण भोजन ग्रहण करीत असताना यजमान यांनी होमहवन केला पाहिजे. पुराणात सांगितलेल्या व्रतापेक्षा अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ आहे.\nजे भाविक विधीपूर्वक अन्नदान करतात त्यांना पुण्य मिळत असते. कुंभमेळा भरतो त्या ठिकाण अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. त्र्यंबकेश्वर, उज्जैन, प्रयाग, हरिद्वार येथे अन्नदान केल्याने मनाप्रमाणे फळ मिळते. हरिद्वार येथे येणार्‍या साधूंना खिचड़ी, भात, कच्चे तांदुळ यांचे दान केले जाते. अन्नदाना बरोबरच तिळदानाचेही महत्त्व आहे.\nरशियासाठी पुढील वर्ष विशेष महत्त्वाचे - पुतिन\nअभिनेत्रीच्या भूमिकाही महत्त्वाच्या - असीन\nकोळी लोकांचा महत्त्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा\nयावर अधिक वाचा :\nकुंभमेळ्यात अन्नदानाला महत्त्व महाशिवरात्रि\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nहिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण\nहिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\nअनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ ...\nप्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण...Read More\nव्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता. कामावर प्रभाव पडेल. अचानक खर्च वाढेल....Read More\nजास्त सहयोग मिळेल. कार्यकुशलतेचा लाभ मिळेल. पारिवारिक लाभ घ्या. नोकरीत विशेष सावधगिरी बाळगा. विश्वासात राहू नये. अनिश्चिततेचे वातावरण. निराशा वाढेल....Read More\n\"आर्थिक नुकसान संभव. कामात गुप्तता राखा. सहयोग मिळेल. संबंध बिघडतील. अव्यवहारिक कामांपासून लांब रहा. आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त ठेवा. मानसिक संतोष...Read More\n\"वैचारिक असंतोष राहील. कामात मन रमणार नाही. तब्बेतीची काळजी घ्या. व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील. आर्थिक जबाबदार्‍या वाढतील. आत्मविश्वास वाढेल. कामात...Read More\n\"आपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिक दृष्‌ टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. अडचणी येतील. सतत...Read More\n\"उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता वाटेल. शत्रुपक्षाच्या कारवाया...Read More\n\"खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. नोकरीत नुकसानी संभव. कामात पारदर्शकता हवी. वैचारिक धारणेत राहू नका....Read More\n\"शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमणार नाही. विश्वास कमी राहील. व्यर्थ ताण जाणवेल. पारिवारिक वाद वाढतील.खर्च...Read More\n\"मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात आत्मविश्वास कमी राहील....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि होऊ शकते. नियंत्रण...Read More\n\"आपल्या प्रयत्नाने उन्नति कराल. धनलाभ होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. आपल्या प्रयत्नांमुळे व्यापारात वृद्धि होईल. नवीन कामांना चालना मिळेल. आपल्या यशाचा...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-childhood-will-be-history-49242", "date_download": "2018-08-18T08:25:38Z", "digest": "sha1:DCFKA4HGTD2QMUOPAAZSA6GUHUNWEZBF", "length": 12957, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news Childhood will be history! बालचित्रवाणी होणार इतिहासजमा ! | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 1 जून 2017\nनिधी नसल्याने बालचित्रवाणी बंद करण्याचा निर्णय\nनिधी नसल्याने बालचित्रवाणी बंद करण्याचा निर्णय\nमुंबई - रेडिओ, दूरदर्शनच्या माध्यमातून शालेय शिक्षणाचे धडे देऊन शिक्षणाचे महत्त्व वेळोवेळी विशद करणाऱ्या व समाजात शिक्षणासाठी जनजागृती करणाऱ्या राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था अर्थात बालचित्रवाणी या संस्थेला अखेर टाळे लागणार असून, ती कायमची आता इतिहासजमा होणार आहे. यासाठी शालेय शिक्षण विभागाने आज एक शासन निर्णयाद्वारे ही संस्था बंद करत असल्याचे जाहीर केले आहे. बालचित्रवाणी बंद करून त्यासोबतच अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बालभारतीचेही ई-बालभारतीत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.\nतीन दशकांहून अधिक काळ शिक्षणाच्या क्षेत्रात आपला कायम वेगळा ठसा उमटविणाऱ्या बालचित्रवाणीला चालविण्यासाठी सरकारकडे निधी नसल्याचे कारण सांगून ती बंद केली जाणार आहे. राज्यातील शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात बालभारतीसोबतच बालचित्रवाणी या स्वायत्त संस्थेचे मोठे योगदान राहिलेले आहे. इन्सॅट उपग्रहाद्वारे बालचित्रवाणीचे कार्यक्रम राज्यातील गावागावांमध्ये पोचविले जात होते. 27 जानेवारी 1984 रोजी बालचित्रवाणीची स्थापना झाली होती. या संस्थेकडून सुमारे 6000 हून अधिक शैक्षणिक दृकश्राव्य साहित्याची निर्मिती करण्यात आली होती. ऑगस्ट 2012 पासून दूरदर्शनवर बालचित्रवाणीच्या कार्यक्रमाला शुल्क आकारणी केली जात असताना त्यासाठीचे अनुदान केंद्राकडून आले नाही. यामुळे फेब्रुवारी 2014 पासून दूरदर्शनवर बालचित्रवाणीचे कार्यक्रम बंद करण्यात आले होते.\nयादरम्यान, राज्य सरकारने बालचित्रवाणीचे प्रक्षेपण सुरू राहावे, यासाठी कोणीतीही उपाययोजना केली नसल्याने बालचित्रवाणीला जीवदान मिळू शकले नाही. बालचित्रवाणी वाचविण्याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची असताना त्यांनी ती पार पाडली नसल्याने बंद करण्याचा निर्णय घेतला असून, राज्याच्या शैक्षणिक हितासाठी मारक असल्याच्या प्रतिक्रिया शैक्षणिक क्षेत्रात उमटल्या आहेत, तर बालभारतीचे ई-बालभारती करण्यावरही उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत.\nबारामती - विद्या प्रतिष्ठानच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पुरस्कार\nबारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nउंड्री - पाचव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजूर ठार\nउंड्री - गुलाम अली नगर गल्ली नं 6 दि.13 ऑगस्ट दु.12.30 वाजता एका निर्माणाधीन इमारतीचे काम सुरू असताना पाचव्या मजल्यावर पडून राजशेखर माशाले (वय 33...\nपिंपळवंडीला मानव-बिबट सहजीवन जनजागृती\nजुन्नर - पिंपळवंडी ता.जुन्नर येथे मानव व बिबट संघर्ष व सहजीवन याविषयी मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती करण्यात आली. जुन्नर वन विभाग तसेच...\nचिंचवडमध्ये रविवारी रंगणार महिला प्रेरणा संमेलन\nवाल्हेकरवाडी - स्वयंसिद्धा प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड शहर) आणि प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि. 19 ऑगस्ट) चिंचवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-sinking-incident-ganapatipule-sea-beach-79593", "date_download": "2018-08-18T08:30:08Z", "digest": "sha1:VED4NERBF2ZHOXITRGSV3QIOKAIJ2GH3", "length": 13480, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "ratnagiri News sinking incident on Ganapatipule sea beach गणपतीपुळेत बुडणाऱ्या सांगलीच्या दोघांना वाचवले | eSakal", "raw_content": "\nगणपतीपुळेत बुडणाऱ्या सांगलीच्या दोघांना वाचवले\nरविवार, 29 ऑक्टोबर 2017\nगणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आज सायंकाळी आणखी दोन पर्यटकांना बुडता बुडता वाचविण्यात स्थानिकांना यश आले; पण या रोजच्या घटनांना थांबवायचे कुणी या गंभीर आणि गहन प्रश्‍नावर विचार करायला सुरक्षा यंत्रणांना वेळच नाही.\nगणपतीपुळे - समुद्रात पोहण्याचे आकर्षण असलेल्या पर्यटकांनी येथील जीवरक्षक, स्थानिक आणि वॉटरस्पोर्टस्‌ चालकांच्या नाकीनऊ आणले आहे. धोक्‍याच्या सूचनांना फाटा देत अतिउत्साहाने पर्यटक समुद्रात उतरून मृत्यूला निमंत्रण देत आहेत.\nदिवाळीच्या सुटीत दरदिवशी ‘बुडणाऱ्याला वाचवले’ अशा घटना घडत आहेत. परंतु पोलिस, जिल्हा प्रशासन किंवा जिल्हा परिषदेने डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. मोठी दुर्घटना घडण्याची ते वाट पाहत आहेत की काय, अशी संतप्त प्रतिक्रिया जनमानसातून उमटत आहे.गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आज सायंकाळी आणखी दोन पर्यटकांना बुडता बुडता वाचविण्यात स्थानिकांना यश आले; पण या रोजच्या घटनांना थांबवायचे कुणी या गंभीर आणि गहन प्रश्‍नावर विचार करायला सुरक्षा यंत्रणांना वेळच नाही.\nमहूद (जि. सांगली) येथील अण्णा दत्ता जाधव (वय २४) व सोमनाथ दशरथ जाधव (वय ३०) हे दोघे आज बुडता-बुडता वाचले. पोहण्याच्या मोहात खोल समुद्रात ते गेले. गणपतीपुळे येथे समुद्राच्या मोठ्या चाळात ते सापडले आणि बुडू लागले; मात्र आरडाओरड झाल्यानंतर येथील ग्रामपंचायतीचे जीवरक्षक रोहित चव्हाण, अनिकेत राजवाडकर, सानिका वॉटर स्पोर्टस्‌चे मालक प्रमोद डोर्लेकर, नाना डोर्लेकर यांनी दोघांनाही बुडताना चाळातून बाहेर काढले.\nदिवाळीची सुटी असल्याने गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात पर्यटकांची दररोज तोबा गर्दी असते. अगदी भाऊबीजेपासून आजपर्यंत एक-दोघेजण बुडता बुडता वाचताहेत; मात्र जीवरक्षक व व्यावसायिक पर्यटकांवर लक्ष ठेवून असल्याने कोणाचा जीव गेलेला नाही. डेंजर झोनचे बॅरेकेट लावा किंवा मोठा बोर्ड लावा, याकडे कानाडोळा करून व येथील जीवरक्षक तसेच पेट्रोलिंग करणारे पोलिस यांनी दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यामुळे रोज हे प्रकार घडत आहेत. तीर्थक्षेत्राचे नाव बदनाम होऊ नये, यासाठी पोलिस, ग्रामपंचायत, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद या यंत्रणांनी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. तरच भविष्यातील एखाद्या मोठ्या दुर्घटनेला तोंड द्यावे लागणार नाही.\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून सहाजण जखमी\nबेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने बंगळूरकडे जाणारी व्हीआरएलची आराम बस उलटून चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय...\nउंड्री - पाचव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजूर ठार\nउंड्री - गुलाम अली नगर गल्ली नं 6 दि.13 ऑगस्ट दु.12.30 वाजता एका निर्माणाधीन इमारतीचे काम सुरू असताना पाचव्या मजल्यावर पडून राजशेखर माशाले (वय 33...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%AE/", "date_download": "2018-08-18T09:05:23Z", "digest": "sha1:OMIO2EUN3XBPEVN7ZNTZW2PQCPFS6LUW", "length": 5399, "nlines": 63, "source_domain": "m4marathi.com", "title": "स्कूल चले हम....... | m4marathi", "raw_content": "\nग्रामीण भागात दुचाकीवरून फिरतांना कधी एखाद्या शाळकरी मुलाने तुमच्याकडे लिफ्ट मागितली आहे कधी मागितली तर अवश्य लिफ्ट द्या कधी मागितली तर अवश्य लिफ्ट द्या बऱ्याचदा हि मुले गरीब घरची किंवा आदिवासी वस्तीतली असतात. साधन कुटुंबातील मुले एकतर रिक्षा, स्कूलबस किंवा त्यांना कुणीतरी वाहनाने शाळेत सोडायला जात असतात. मात्र गरीब किंवा आदिवासी मुलांच्या पालकांना दोन वेळच्या जेवणाची सोय करायची असल्याने कामापासून फुरसतही मिळत नाही आणि त्यांच्याकडे वाहनाचीही व्यवस्था नसते. शाळा दूर असल्याने आणि शाळेत जाण्यासाठी वाहन करण्याची ऐपत नसल्याने बिचारी पायी चालतच शाळा गाठतात. हे अंतर काही मैलांचेही असू शकते. आपल्या रस्त्यात त्यांची शाळा येत असल्यास त्यांना लिफ्ट देण्यात काय हरकत आहे\nअशा मुलांना लिफ्ट दिल्यावर त्यांच्याशी संवाद साधला तर फार गमतीशीर वाटते त्यांना शाळेविषयी एखादा प्रश्न विचारल्यास ते अभिमानाने त्याचे उत्तर देतात. आपण त्यांना मदत केली म्हणून कृताज्ञातही व्यक्त करतात. आदिवासी लोकांमध्ये पूर्वी शिक्षणाविषयी अनास्था होती. त्यामुळे त्यांच्या कित्येक पिढ्या शिक्षणापासून वंचित राहिल्या. आता मात्र सर्व शिक्षा अभियानामुळे आदिवासी पाड्या-वस्त्यांवरील मुले शाळेत जाऊ लागली आहेत. निरक्षरतेचा नायनाट होऊन साक्षर भारत बनविण्याचा ह्या योजनेचा मुळ उद्देश आहे. ‘स्कूल चले हम’ च्या योजनेला आपणही आपले काम करता-करता लावलेला हातभार नक्कीच मोलाचा ठरू शकतो\nनितीश कुमार ह्यांचा राजीनामा\nभाऊ रायला ओवाळीते ताईची माया\nवृक्षवल्ली आम्हा सोयरे फक्त म्हणायचे कि तसे वागायचे ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%97/", "date_download": "2018-08-18T08:01:08Z", "digest": "sha1:QZRGASU4TFSD65BUJ3K5WRM7UND24XCN", "length": 8061, "nlines": 125, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोयाळी पुनर्वसन शाळेचे गुणवत्ता यादीत यश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकोयाळी पुनर्वसन शाळेचे गुणवत्ता यादीत यश\nशिक्रापूर- शिक्रापूर (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोयाळी पुनर्वसन या शाळेतील चाळीस विद्यार्थी या वर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात चमकले असून, अद्वय मोकळ आणि सुयश ठाणगे यांनी राज्य गुणवत्ता यादीत क्रमांक मिळविला आहे, असल्याची माहिती मुख्याध्यापिका राधिका पावसे यांनी दिली आहे.\nशिक्रापूर (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , कोयाळी पुनर्वसन या शाळेतील जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये चमकलेले विद्यार्थी आणि त्यांनी मिळविलेले गुण पुढीलप्रमाणे – अद्वय मोकळ (276), सुयश ठाणगे (268), दर्शिका पवार (262), सार्थक घटे (262), अनुजा गरड (260), अभिजित भालेकर (258), स्मृती सांगळे (256), प्रणव भुजबळ (250), अदिती चव्हाण (250), श्रावणी नाईक (250), साजिरी धुमाळ (250), कीर्ती पठाडे (248), अजिंक्‍य भोरे (246), समृद्धी जाधव (246), श्रावणी भुजबळ (246), अथर्व वाघोले (244), शिवम मोरे (242), आदेश पऱ्हाड (236), गायत्री गरड (240), समृद्धी चाकणे (240), वैष्णवी भापकर (240), सिद्धेश लांडगे (234), मधुरा नाणेकर (232), मयंक प्रसाद (230), दीपाली मानवर (230), अथर्व रणसिंग (228), वैभवी लोखंडे (228), अर्शलान शेख (228), सुरज गर्जे (226), अनमोल शिळमकर (224), नंदनी पटेल (224), विश्वा कोरे (224), अपेक्षा चाळक (222), श्रावणी आढाव (222), शंतनू गोडसे (218), साक्षी डफळ (218), हर्षवर्धन सासवडे (216), आयुष फटांगरे (216), शुभदा गेजगे (214), अनुज धुमाळ (214). अशा प्रकारे या विद्यार्थ्यांनी गुण मिळवून यश संपादित केले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांना तत्कालीन मुख्याध्यापक संतोष गोसावी तसेच रत्नमाला कामठे व रोहिणी धुमाळ यांनी मार्गदर्शन केले आहे. शाळेच्या या अभूतपूर्व यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका पावसे, माजी सरपंच रामभाऊ सासवडे, माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले, शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा दिपाली गिलबिले, उपाध्यक्ष अविनाश पानमंद, ग्रामपंचायत सदस्या रोहिणी गिलबिले आदींनी विशेष अभिनंदन केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमैत्री दिनी विनोद कांबळी व सचिन तेंडुलकर यांनी एकमेकांना ‘अशा’ पद्धतीने दिल्या शुभेच्छा…\nNext articleमधुमेहात घ्या पायांची काळजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/apple-company-market-value-1-trillion-dollar-share-market-india-world-bank/", "date_download": "2018-08-18T08:01:04Z", "digest": "sha1:QOQHSRU4MA4FQF5AGQLMJP7LLBWQAWJW", "length": 7531, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘अॅपल’ कंपनीचे बाजारमूल्य जगातील अनेक देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘अॅपल’ कंपनीचे बाजारमूल्य जगातील अनेक देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त\nनवी दिल्ली – प्रसिद्ध मोबाईल कंपनी अॅपलने जगात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अॅपल या कंपनीचे बाजारमूल्य गुरुवारी १ ट्रिलियन डॉलर एवढे झाले. यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात बाजारमूल्य असणारी अॅपल कंपनी अमेरिकेतील पहिली व जगातील दुसरी कंपनी बनली आहे.\nअॅपलच्या कंपनीचे बाजारमूल्य अनेक देशांच्या जीडीपीपेक्षा अधिक आहे. जगातील सहावी अर्थव्यवस्था असलेल्या भारताच्या जीडीपीतील ३८ टक्क्यांच्या हिस्स्याची बरोबरी अॅपलने केली आहे. याचबरोबर अॅपलने भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टीसीएससारख्या तगड्या कंपन्यांना मागे सोडले आहे. तर पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा तीन पट जास्त अॅपलचे बाजारमूल्य आहे.\nवर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार, जगातील १७७ देशांच्या जीडीपीपेक्षा अधिक अॅपलच्या कंपनीचे बाजारमूल्य आहे. तर केवळ १६ देशांचे जीडीपी या मुल्यापेक्षा जास्त आहेत.\nदरम्यान, मंगळवारी अॅपल कंपनीने आपली आर्थिक स्थितीची माहिती गुंतवणुकदारांना दिली. यानंतर बाजारात अॅपलच्या शेअर्सचे भाव कमी झाले होते. परंतु गुरुवारी पुन्हा बाजारात अॅपलच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसलमान – कतरिना शोस्टॉपर\nNext article२५ जणांमध्ये आढळले अन्नबाधेची लक्षणे\n“प्रत्येकाच्या मनात सद्भावना असल्यास देशात सहिष्णुता नांदेल’\nनिम्म्या कर्नाटकवर दुष्काळाचे सावट; मात्र काही भागांत पूरस्थिती\nकाश्‍मीरमधील ग्रेनेड हल्ल्यात एकाचा मृत्यूू, तिघे जखमी\nछत्तीसगडमध्ये भिंत कोसळून तीन ठार\nसात दिवस केरळमध्ये फोन कॉल आणि मोबाईल डाटा वापर विनामुल्य\nअभिनेत्रीच्या सतर्कतेतून लहान मुलांच्या तस्करीचे रॅकेट उघड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/marathakrantimorcha-maratha-reservation-agitation-st-maharashtra-close-136317", "date_download": "2018-08-18T09:03:35Z", "digest": "sha1:JSTKLU4VG7GYLNRZ7VXRYT72Z5IKPTQ2", "length": 11437, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "#MarathaKrantiMorcha maratha reservation agitation ST Maharashtra Close #MarathaKrantiMorcha 9 ऑगस्टची एसटीला धास्ती | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha 9 ऑगस्टची एसटीला धास्ती\nबुधवार, 8 ऑगस्ट 2018\nमुंबई - मराठा आरक्षणासाठी 9 ऑगस्टला होत असलेल्या महाराष्ट्र बंदची एसटीला धास्ती लागली आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर विभागीय नियंत्रकांना काळजी घेण्याच्या सूचना व्यवस्थापनाने दिल्या आहेत.\nमुंबई - मराठा आरक्षणासाठी 9 ऑगस्टला होत असलेल्या महाराष्ट्र बंदची एसटीला धास्ती लागली आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर विभागीय नियंत्रकांना काळजी घेण्याच्या सूचना व्यवस्थापनाने दिल्या आहेत.\nमराठा आंदोलनाची सर्वाधिक झळ एसटीला बसल्यामुळे बंदच्या दिवशी सेवा सुरू ठेवायची की बंद, या संभ्रमावस्थेत व्यवस्थापन असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील आंदोलनामध्ये सरकारवरील रोषाचा सगळ्यात जास्त फटका एसटीला बसला आहे.\n5 जून 2017 ते 18 जुलै 2018 दरम्यान एकूण 222 एसटी बसचे 60 लाख 88 हजार रुपयांचे नुकसान झाले होते. मराठा आरक्षण आंदोलनामध्ये 365 गाड्यांची मोडतोड करण्यात आली आहे. यामुळे महामंडळाला तब्बल दीड कोटी रुपयांचा फटका बसला आहे. याशिवाय 22 कोटी 25 लाखांचा महसूलही बुडाला आहे.\nमराठा समाजातील आंदोलक एसटीला लक्ष्य करीत नाहीत. काही समाजकंटक त्यांच्या आडून एसटीवर दगड मारतात. संघटनांनी सहकार्य केले आहे. त्यामुळे एसटी सुरू राहतील. तोडलेल्या एसटी पुन्हा दुरुस्त करता येतील; पण मराठा आरक्षणासाठी गेलेले जीव परत येतील का\n- दिवाकर रावते, परिवहनमंत्री\nभाषणात मोठी ताकद आहे.. : बबन साळगांवकर\nसावंतवाडी : भाषणात मोठी ताकद आहे त्याच वक्तृत्वाचा फायदा घेऊन तब्बल 23 दिवसांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे पहिल्यांदा आमदार बनले आणि त्यांनी नंतर...\nपंकज भूसे यांचा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव\nसरळगांव - महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी होऊन दिलेल्या उद्दिष्टा पेक्षा जास्त वृक्ष लागवड करून उत्कृष्ट कामगिरी केल्याने...\nचिंचवडमध्ये रविवारी रंगणार महिला प्रेरणा संमेलन\nवाल्हेकरवाडी - स्वयंसिद्धा प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड शहर) आणि प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि. 19 ऑगस्ट) चिंचवड...\nदूध भुकटी उद्योग संकटात ; शेतकऱ्यांना वाढीव दराची प्रतीक्षाच\nसोलापूर : दूध व दुग्धजन्य पदार्थांची देशांतर्गत गरज भागवून शिल्लक दुधापासून भुकटी बनविली जाते. परंतु, सद्यःस्थितीत महाराष्ट्रात 30 हजार टन तर...\nजिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांची मुलाखत\nलोणी काळभोर - माथाडी माफिया, लॅन्ड माफिया, सॅऩ्ड माफिया, खाजगी सावकारांच्या बरोबर कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहचवणाऱ्यांना वठणीवर आनण्यासाठी तडीपारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/school-wall-collapses-mokhada-131829", "date_download": "2018-08-18T09:03:09Z", "digest": "sha1:SGT52J67AYRR6R372APJ3CWHTYTTKSFI", "length": 15739, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "School wall collapses in mokhada दैव बलवत्तर म्हणून वाचले 47 विद्यार्थ्यांचे जीव | eSakal", "raw_content": "\nदैव बलवत्तर म्हणून वाचले 47 विद्यार्थ्यांचे जीव\nगुरुवार, 19 जुलै 2018\nमोखाडा : तालुक्यातील शेलमपाडा जिल्हापरिषद शाळेच्या दोन वर्गखोल्या मंगळवारी रात्री मुसळधार पावसामूळे कोसळल्या आहेत. त्यामूळे सद्यस्थितीत एका समाजमंदिरात विद्यार्थ्यांची तात्पूर्ती शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ही घटणा रात्री उशीरा घडल्याने 47 विद्यार्थी बचावले आहेत. या दुर्घटनेमुळे जि.प.बांधकाम विभाग आणि शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.\nमोखाडा : तालुक्यातील शेलमपाडा जिल्हापरिषद शाळेच्या दोन वर्गखोल्या मंगळवारी रात्री मुसळधार पावसामूळे कोसळल्या आहेत. त्यामूळे सद्यस्थितीत एका समाजमंदिरात विद्यार्थ्यांची तात्पूर्ती शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ही घटणा रात्री उशीरा घडल्याने 47 विद्यार्थी बचावले आहेत. या दुर्घटनेमुळे जि.प.बांधकाम विभाग आणि शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.\nतालुक्यातील 38 शाळा धोकादायक आहेत. मात्र असे असतानाही या शाळा आजही दुरूस्तीच्या प्रतिक्षेत आहेत. मागील आर्थिक वर्षात शाळा दुरूस्तीवर एकट्या मोखाडा तालुक्यात 1 कोटी 32 लाख 88 हजार 668 रूपये एवढा निधी खर्च होवूनही मोखाड्यातील कमकुवत शाळा अतिवृष्टीमुळे मोडून पडत आहे. एवढी भयानक परिस्थिती जिल्हा परिषद शाळांची होऊन बसली आहे.\nशेलमपाडा जिल्हापरिषद शाळेच्या दुरूस्तीबाबत सन 2015 सालापासून पत्रव्यहार करून पाठपुरावा करण्यात येत असल्याचे केंद्रप्रमूख घनशाम कांबळे यांनी सांगीतले. असे असतानाही ही शाळा दुरूस्तीपासून वंचित राहिली आहे. तर अनावश्यक शाळा दुरूस्ती करून त्यावर लाखो रूपये खर्च केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.\n'सकाळ'ने वर्तवला होता अंदाज\nमोखाड्यातील 38 शाळा धोकादायक या मथळ्याखाली 'सकाळ'ने 29 जूनला बातमी प्रसिद्ध केली होती. तसेच जिल्हा परिषद प्रशासनाला जागे केले होते. मात्र, त्यावर जिल्हा परिषद आणि मोखाडा पंचायत समिती ने कुठलीही कार्यवाही न केल्याने शेलमपाडा येथील शाळेच्या दोन ईमारती कोसळल्या आहेत.\nयाबाबत प्रभारी गटशिक्षणाधिकारी रामचंद्र विशे यांच्याशी संपर्क साधला असता मागील वर्षी 28 शाळा मंजूर होत्या पैकी 17 शाळा दुरूस्त झाल्या आहेत. तर 7 शाळा प्रगतीपथावर असून चालू वर्षी 28 शाळा दुरूस्तीसाठी प्रस्तावित असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. अतिधोकादायक शाळांबाबत त्यांना छेडले असता धोकादायक शाळा पाडण्याबाबत उशिराने प्रस्ताव आला असल्याची माहितीही विशे यांनी दिली आहे. यावर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.\nमोखाडा तालुक्यातील शाळा दुरूस्ती साठी 1 कोटी 32 लाख 88 हजार 668रुपये एवढा निधी क्षेत्रफळापेक्षा जास्त देवूनही, अत्यावश्यक दुरूस्तीबाबत चालढकल करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाईचे आदेश देणार असल्याची माहिती जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती निलेश गंधे यांनी दिली आहे. आमच्या शाळेची दुरूस्ती करण्याबाबत वारंवार लेखी पत्रव्यवहार तसेच पंचायत समिती सभापती यांनाही धोकादायक परिस्थितीची माहिती देवूनही आमची शाळा दुरूस्तीला पारखी राहिलेली आहे. सुदैवाने शाळा रात्री कोसळली आहे. मात्र दिवसा कोसळली असती तर विद्यार्थ्यांच्या जीवितहानी झाली असती, त्यास कोणाला जबाबदार धरले असते. असा खरमरीत सवाल शेलमपाडा येथील माजी सरपंच दिलीप जागले यांनी केला आहे.\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nबारामती - विद्या प्रतिष्ठानच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पुरस्कार\nबारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून सहाजण जखमी\nबेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने बंगळूरकडे जाणारी व्हीआरएलची आराम बस उलटून चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/control-maratha-community-says-raju-shetty-134849", "date_download": "2018-08-18T09:02:44Z", "digest": "sha1:ASCFTF2LSBSMDD74ZIF4MLACJCBGMNR4", "length": 13814, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "control of Maratha community says raju Shetty मराठा समाजाने संयम बाळगावा - शेट्टी | eSakal", "raw_content": "\nमराठा समाजाने संयम बाळगावा - शेट्टी\nबुधवार, 1 ऑगस्ट 2018\nपुणे - सर्व पक्ष आणि संघटनांनी मागण्यांना पाठिंबा दिला आहे. लढा अंतिम टप्प्यात आला आहे, त्यामुळे मराठा समाजाने संयम बाळगावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी केले.\nपुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने शेट्टी यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी हे आवाहन केले. या वार्तालापात दूध आंदोलन, पक्षाची पुढील वाटचाल, मराठा, धनगर आरक्षण याबरोबरच आगामी निवडणुकीत पक्षाची काय भूमिका राहणार यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले.\nपुणे - सर्व पक्ष आणि संघटनांनी मागण्यांना पाठिंबा दिला आहे. लढा अंतिम टप्प्यात आला आहे, त्यामुळे मराठा समाजाने संयम बाळगावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी केले.\nपुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने शेट्टी यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी हे आवाहन केले. या वार्तालापात दूध आंदोलन, पक्षाची पुढील वाटचाल, मराठा, धनगर आरक्षण याबरोबरच आगामी निवडणुकीत पक्षाची काय भूमिका राहणार यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले.\nमराठा समाजाने यापूर्वी आरक्षणाच्या मागणीसाठी 57 मोर्चे शांततेत काढले. जगभर त्याचे कौतुक झाले; परंतु सरकारने त्यांची दखल घेतली नाही, असे सांगून शेट्टी म्हणाले, \"\"चार दिवसांत दगडफेक सुरू झाल्यानंतर सरकारची पळापळ सुरू झाली. चळवळीतील कार्यकर्त्यांनी याचा काय अर्थ घ्यावयाचा. लाल फितीतील सरकारची यंत्रणाच हे करावयाला भाग पडते. या समाजामध्ये विश्‍वास निर्माण करण्यास हे सरकार कमी पडले.''\nविचार न करता आश्‍वासने दिली. नागरिकांच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या. त्यातून हा गोंधळ निर्माण झाला आहे, असे सांगून शेट्टी म्हणाले, \"\"आर्थिक निकषांवर आरक्षण देणे अडचणीचे ठरेल. सहकारामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचे आरक्षण आहे; परंतु त्यांच्या जागी कोण येते, कशा गडबडी होतात. हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे कोणताही ठोस पर्याय असल्याशिवाय अशा पद्धतीने आरक्षण देणे योग्य राहणार नाही.''\nसगळ्याच पक्षांना सध्या समान अंतरावर ठेवले आहे, असे सांगून शेट्टी म्हणाले, \"\"या आधीचे सरकार नाठाळ होते; परंतु एका टप्प्यानंतर ते बदल करावयास, चर्चा करण्यास तयार होत असे; परंतु सध्याचे सरकार म्हणजे जगातील सर्व सत्य आम्हाला माहीत आहे, अशा अविर्भावात आहे. ऐकून घेण्यास तयार नाही. त्यामुळे यापुढे कोणत्याही परिस्थितीत भाजपबरोबर जाणार नाही.''\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून सहाजण जखमी\nबेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने बंगळूरकडे जाणारी व्हीआरएलची आराम बस उलटून चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय...\nवाहून गेलेला तरुण तीस तासांनंतरही सापडेना\nजळगाव ः येथील अयोध्यानगराजवळील नाल्याला काल झालेल्या पावसामुळे पूर आला होता. या पुरात इतर नागरिकांना मदत करणारा तरुण पाय घसरून नाल्यात पडून वाहून...\n13 वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू\nवारजे (पुणे) : महापालिकेच्या पथदिव्याच्या विजेच्या खांबाला धक्का लागून वारजे परिसरातील तेरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे....\nमांजरी - प्रदर्शनाच्या नावाखाली उद्योजकांना लाखोंचा गंडा\nमांजरी - दुबई येथे उद्योग प्रदर्शनाचे अमीष दाखवून पिंपळे सौदागर येथील इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या नावाखाली एका दांपत्याने शहर व जिल्ह्यातील सुमारे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/pune-university-institutional-operator-admission-seats-increase/", "date_download": "2018-08-18T08:00:48Z", "digest": "sha1:FU6APD3OWORSLQ2BGT3KEHHZGSUFWN6I", "length": 15121, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – पुन्हा जागा वाढवून मिळण्यासाठी दबाव | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे – पुन्हा जागा वाढवून मिळण्यासाठी दबाव\nविद्यापीठाकडून रिक्‍त जागांचा आढावा : निर्णय अद्यापपर्यंत ठेवला राखून\nपुणे – शहरातील प्रतिष्ठित वरिष्ठ महाविद्यालयाच्या बीए, बीकॉम आणि बीएस्सी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एकूण प्रवेश क्षमतेच्या 10 टक्‍के जागा वाढवून देण्यात आले आहेत. त्यानंतर पुन्हा दहा टक्‍के जागा वाढवून मिळावी, अशी मागणी संस्थाचालकांद्वारे विद्यापीठाकडे होत आहे. पुन्हा दहा टक्‍के प्रवेशाच्या जागा भरण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर काही शिक्षणसंस्थांकडून दबावतंत्र वापरला जात असल्याचे दिसून येत आहे.\nइयत्ता बारावीच्या विक्रमी निकालानंतर वरिष्ठ महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा गुणवत्तेचा कस लागत आहे. विशेषत: कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थी संख्या जास्त आणि जागा कमी, या कारणाने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी झगडावे लागत आहे. अशा परिस्थितीत एकूण प्रवेश क्षमतेच्या 20 टक्‍के जागा यंदाही वाढवून मिळेल, असेच संस्थाचालकांना वाटत आहे.\nशहरातील नामांकित महाविद्यालयातील प्रथम वर्ष प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. एवढेच नव्हे, ज्या महाविद्यालयांना दहा टक्‍के प्रवेशाची विद्यापीठाने मुभा दिली आहे, तेही प्रवेश फुल्ल झाले आहेत. मात्र विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी आणखी मागणी होत आहे. त्यामुळे विद्यापीठाने पुन्हा 10 टक्‍के जागा वाढवून मिळण्याचा प्रस्ताव काही महाविद्यालयाने विद्यापीठाकडे सादर केला आहे. त्यावरून पुन्हा दहा टक्‍के जागा वाढवून मिळणार की नाही, याबाबतचा निर्णय विद्यापीठाने अद्यापपर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळे संस्थाचालकांपुढे मोठा प्रश्‍न उभा राहिला आहे.\nविद्यार्थी संख्या 144…शिक्षक 1…गुणवत्तेचे काय\nविद्यापीठाने महाविद्यालयांना संलग्नता देत असताना प्रवेश क्षमतेहून अधिक प्रवेश करता येणार नाही, असे नवीन विद्यापीठ कायद्यात तरतूद आहे. मात्र, शहरातील नामांकित महाविद्यालयांना दहा टक्‍के जागांची मुभा देण्यात आली. त्यानंतरही पुन्हा दहा टक्‍के जागा वाढवून देण्याची मागणी होत आहे. मुळात महाविद्यालयाच्या एका तुकडीची प्रवेश क्षमता 120 असते. त्यानंतर 20 टक्‍के जागा वाढवून दिले तर जवळपास एका वर्गात विद्यार्थी संख्या 144 इतकी राहील. त्यावरून उच्च शिक्षणाची गुणवत्ता राहील, असा प्रश्‍न शिक्षणतज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.\nएजंटगिरी होत असल्याचा आरोप\nविद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी विद्यापीठाकडून दरवर्षी 20 टक्‍के जागा महाविद्यालयांना वाढवून देतात. मात्र वाढीव जागांवरील प्रवेश हे गुणवत्तेनुसार होतात, याविषयी साशंकता आहे. संस्था आपल्या स्तरावर हे प्रवेशप्रक्रिया राबवित असतात. त्यामुळे होतकरू विद्यार्थ्यांना वाढीव जागेवर प्रवेश मिळेलच असे नाही. शिवाय, शेवटच्या टप्प्यात होणारे प्रवेश आरक्षणानिहाय होत नाही. त्यात एजंटगिरी होत असल्याचे विद्यार्थी संघटनेचे म्हणणे आहे.\nसंस्थाचालकांच्या आदेशानुसार प्राचार्यांना वाढीव जागेवर प्रवेश करावे लागते. त्यात प्राचार्यांना स्वत:च्या अधिकारातही गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश देणेही अडचणीचे आहे. विद्यापीठाने अद्याप पुन्हा 10 टक्‍के जागांवर प्रवेशास मुभा दिली नाही. मात्र काही संस्थाचालकांनी विद्यापीठाकडून जागा प्रवेशास मान्यता मिळेल, असे गृहित धरून प्रवेशाची यादीही तयार केली आहे. त्यामुळे ऐनवेळी विद्यापीठाने जागा वाढवून देणार नसल्याचा निर्णय घेतल्यास संस्थाचालक तोंडघशी पडणार आहेत. या सर्व प्रकारात प्राचार्यांना मात्र तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.\nरिक्त जागांचा विचार होणे आवश्‍यक\nशहरातील मोठ्या महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशासाठी 5 हून अधिक तुकड्या आहेत. या महाविद्यालयांना 20 टक्‍के जागा भरण्यास मुभा दिली तर जवळपास एक नवीन तुकडी सुरू करता येणे शक्‍य आहे. मात्र नवीन तुकडी, तेथे शिक्षक, त्यांना वेतन अशी आर्थिक बाब पूर्ण करण्यापेक्षा संस्थाचालकांना जागा वाढवून मिळण्यास प्राधान्य असतो. दरम्यान, शहर व उपनगरच्या काही महाविद्यालयात प्रथम वर्षाचे प्रवेशाचा जागा रिक्‍त आहेत. त्याचाही विचार होणे आवश्‍यक आहे.\nकाही महाविद्यालयांनी पुन्हा 10 टक्‍के जागा वाढवून मिळण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, यापूर्वीच दहा टक्‍के जागा महाविद्यालयांना वाढवून दिल्या आहेत. आता पुन्हा द्यायच्या का नाही याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. शहरातील सर्व महाविद्यालयांतील रिक्‍त प्रवेशाचा आढावा घेण्यात येत आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.\n– डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभारत अ संघाची विजयाकडे वाटचाल; दक्षिण आफ्रिका अ संघ 239 धावांनी पिछाडीवर\nNext articleझेल सुटण्याची दोन्ही संघांसमोर समस्या: बेलिस\nसारथी उपक्रमातून 5 लाख लोकांचे शंका निरसन\nपुणे – दोनशेहून अधिक जणांकडून दावे दाखल\n“भुक मुक्त’ पुण्यासाठी स्मार्ट सिटीचा पुढाकार\nकचरा प्रकल्पांची क्षमता वाढवा\n24 तासांमध्ये मिळणार वीजग्राहकांना संपूर्ण माहिती\nअजित पवार यांनी घेतला जिल्हा परिषदेच्या कारभाराचा आढावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A7-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%A1/", "date_download": "2018-08-18T08:00:00Z", "digest": "sha1:2DMF4DS464JZJS4UL2OKECNC67BBRMEX", "length": 8618, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "घटनात्मक वैध आरक्षण तातडीने द्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nघटनात्मक वैध आरक्षण तातडीने द्या\nमराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nपुणे – मराठा समाजाला घटनात्मक वैध आरक्षण मिळण्यासाठी सर्व बाजूने आवश्‍यक कार्यवाही करावी या आणि प्रमुख मागण्यांचे निवेदन गुरूवारी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.\nजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की राज्य मागासवर्गीय आयोगाने लवकरात लवकरात आपला अहवाल द्यावा. यासाठी शासनासाठी त्यांना आवश्‍यक ती सर्व साधनसामग्री तातडीने द्यावी. राजर्षि शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी. डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता द्यावा. प्रत्येक जिल्ह्यात मराठा भवनासाठी शासकीय जमीन द्यावी.\nमराठा-कुणबी ओबीसी जात प्रमाणपत्र योजनेतील प्रक्रिया सुटसुटीत करावी. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकाससंस्थेच्या (सारथी)माध्यमातून मराठा समाजातील तरुणांसाठी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात यावीत. त्यासाठी निधी द्यावा. ईएसबीसी प्रवर्गातील यापूर्वी नोकरीत लागलेल्या उमेदवारांना शासकीय सेवेत कायम नोकरीत घ्यावे.\nमराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत. अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदीचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा, मराठा, इतर मागास खुला प्रवर्गातील सरकारी अधिकारी कर्मचारी यांचेवर पदोन्नतीत होणारा अन्याय थांबविण्यात यावा, मराठ्यांच्या इतिहासाचे विकृतीकरण व मराठा समाजाची तसेच इतर महामानवाची बदनामी थांबवावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. शासनाने या मागण्याची दखल घेऊन त्या त्वरित सोडवाव्यात. मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा शांततेच्या मार्गाने सुरूच राहणार आहे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकंगना राणावतचे राजकारणाबद्दल बेधडक वक्तव्य\nNext articleमराठा आंदोलनातील काही ठळक मुद्दे\nपोलीस कर्मचाऱ्याने वाचवले ज्येष्ठाचे प्राण\n“प्रत्येकाच्या मनात सद्भावना असल्यास देशात सहिष्णुता नांदेल’\nसर्व शाळांत राबविणार स्वच्छ भारत पंधरवडा\nसमुपदेशनासाठी नवा उपक्रम “चला बोलूया’\nजिल्ह्यामध्ये “भटक्‍या कुत्र्यांची’ दहशत\nबेरोजगार अभियंत्यांना मिळणार कंत्राटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/jitendra-shinde-arrested-40589", "date_download": "2018-08-18T08:41:13Z", "digest": "sha1:E3EU3EKTVJCC4GLEYNSMZAXDU34A5NIV", "length": 11838, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "jitendra shinde arrested बसस्थानकातून जितेंद्र शिंदेला पकडले | eSakal", "raw_content": "\nबसस्थानकातून जितेंद्र शिंदेला पकडले\nमंगळवार, 18 एप्रिल 2017\nतपासी अधिकाऱ्याची सरतपासणी; पीडित मुलीच्या अंगावर जखमा\nतपासी अधिकाऱ्याची सरतपासणी; पीडित मुलीच्या अंगावर जखमा\nनगर - 'कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला असून, तिला उपचारासाठी कुळधरण प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्याची माहिती समजल्यानंतर तेथे गेलो. पीडित मुलीच्या अंगावर, गालावर जखमा होत्या. गळ्यावर काळेनिळे झाले होते. घटनेच्या दुसऱ्या दिवशी पहाटे आरोपी जितेंद्र शिंदे याला श्रीगोंदे बसस्थानकात पकडले. त्या वेळी त्याच्या अंगावरील कपड्यांवर, तसेच घरात घेतलेल्या झडतीमध्ये सापडलेल्या मोबाईलवरही रक्ताचे डाग होते,'' अशी साक्ष आज कर्जत पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक व तपासी अधिकारी शिवाजी गवारे यांनी दिली.\nकोपर्डी अत्याचार व खूनखटल्याची सुनावणी विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरू आहे. विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांची आज सरतपासणी घेतली. गवारे म्हणाले, \"\"मला 13 जुलै 2016 रोजी ठाणेअंमलदाराने कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती दिली. घटनेची खात्री करण्यासाठी मी कोपर्डीकडे निघालो असताना, पीडित मुलीला उपचारासाठी कुळधरण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कुळधरणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन मी पाहणी केली. आरोग्य केंद्रात येण्यापूर्वीच मुलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. मृतदेहाची पाहणी केली असता, पीडित मुलीच्या गालावर, अंगावर जखमा होत्या. गळ्याजवळ काळेनिळे झाले होते.'' गवारेंची उर्वरित सरतपासणी उद्या (मंगळवारी) होणार आहे.\nसंग्रामपूर : वाण धरण ६५ टक्के भरले\nसंग्रामपूर : सातपुडा पर्वतामधील तीन जिल्ह्यांसाठी जलसंजीवनी ठरलेले वाण धरण 65 टक्के भरले आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या ...\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nउंड्री - पाचव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजूर ठार\nउंड्री - गुलाम अली नगर गल्ली नं 6 दि.13 ऑगस्ट दु.12.30 वाजता एका निर्माणाधीन इमारतीचे काम सुरू असताना पाचव्या मजल्यावर पडून राजशेखर माशाले (वय 33...\nरावेतला स्वतंत्र पोलिस चौकीची मागणी\nवाल्हेकरवाडी - रावेत परिसराचा विकास झपाट्याने वाढत आहे, त्याचप्रमाणे गुन्हेगारीही वाढत आहे. रावेत परिसरात गुन्हा घडला अथवा काही कारणास्तव पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://chrome.google.com/webstore/report/olpciokhaoehbpibknihjkhdkdalljog?hl=mr", "date_download": "2018-08-18T08:41:46Z", "digest": "sha1:ZJVEQGQN7SIQ67SSGM2CR25HVNXDC3TJ", "length": 6529, "nlines": 137, "source_domain": "chrome.google.com", "title": "Pokemon लढाई - दुरुपयोग नोंदवा", "raw_content": "\nदुसर्‍या खात्यासह साइन इन करा...साइन आउट करा साइन इन करा\nक्षमस्व, आम्ही अद्याप आपल्या ब्राउझरचे समर्थन करीत नाही. अॅप्लिकेशन, विस्तार आणि थीम्स इंस्टॉल करण्यासाठी आपल्यास Google Chrome आवश्यक असेल.Google Chrome डाउनलोड करा\nअॅप्लिकेशनआर्केड आणि क्रिया Pokemon लढाईदुरुपयोग नोंदवा\nPokemon लढाई साठी दुरुपयोगाची तक्रार नोंदवा\nहा आयटम Chrome वेब स्टोअर आशय धेरणांचे उल्लंघन करतो असे तुम्हाला वाटत असेल तेव्हाच हा फॉर्म वापरा.\nया आयटमचे पुनरावलोकन लिहिण्यासाठी किंवा त्याच्या विकासकाशी संपर्क साधण्यासाठी आयटम तपशील पेजला भेट द्या.\nहिंसक किंवा द्वेषपूर्ण आशय\nमला हा आयटम कधीही नको होता आणि तो कसा इंस्टॉल केला गेला हे माहीत नाही\nमाझ्या काँप्युटरसाठी किंवा डेटासाठी हानिकारक\nत्याचे मूल्य किंवा वैशिष्ट्य यांची चुकीची माहिती देते\nइतर समस्या आहेत - कृपया टिप्पण्यांमध्ये वर्णन करा\nकृपया टिप्पण्या एंटर करा.\nकृपया reCAPTCHA सत्यापित करा\nकॉपीराईट / ट्रेडमार्क: आपल्याला वैध कायदेशीर समस्या असल्यास (म्हणजे कॉपीराईट किंवा ट्रेडमार्क) आणि आपण हा अॅप्लिकेशन काढण्याची विनंती करू इच्छित असल्यास, कृपया आमचा ऑनलाइन सूचना फॉर्म वापरा.\nभाषा: मराठी - स्थान: यूनायटेड स्टेट्स\nआपण ज्या भाषेत Chrome वेब स्टोअर पाहू इच्छिता ती निवडा. असे केल्याने फक्त इंटरफेस बदलेल, अन्य वापरकर्त्यांद्वारे एंटर केलेला कोणताही मजकूर बदलणार नाही.\nआपल्या सामग्रीचे स्थान निवडा\nआपण कोणता प्रदेश पाहू इच्छिता हे निवडा. हे साइटची भाषा बदलणार नाही.\n© 2018 Google - घर - Google बद्दल - गोपनीयता धोरण - सेवा अटी - माझे विस्तार आणि अ‍ॅप्स - विकसक डॅशबोर्ड - वेब स्‍टोअर वारंवार विचारले जाणारे प्रश्न - मदत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/651/Pahat-Jhali-Uddhanatun.php", "date_download": "2018-08-18T08:38:38Z", "digest": "sha1:RKUAD4ND45XF4CWU7XQTKUVFPKQVMQE4", "length": 9690, "nlines": 148, "source_domain": "www.gadima.com", "title": "Pahat Jhali Uddhanatun -: पहाट झाली उद्यानातुन : NonFilmy (Ga.Di.Madgulkar|Manik Varma|Sudhir Phadke) | Marathi Song", "raw_content": "\nया डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती\nपाठलागही सदैव करतील असा कुठेही जगती.\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nचित्रपट: संगितिका 'पारिजातक' Film: Sangitika 'Parijatak'\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nपहाट झाली उद्यानातुन मंदिरी ये गारवा,\nजळते मी हा जळे दिवा\nवचन देउनी नाही आले\nरातभरी मी रडून जागले\nसुकली वेणी, सुकला मरवा\nयुद्धाविण हो रणी पराजीत\nरुद्ध मनोरथ निराश मन्मथ\nआणा चंदन उरी सारवा\nज्योत फिकटली हो अरुणोदय\nपुरूष प्रणय हा केवळ अभिनय\nस्‍त्री हृदयाची त्यास न परवा\nस्मृती तरि ग माझी हरवा\nगदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'\nरघुवीर आज घरी येणार\nरघूवीर आज घरी येणार\nसुखद या सौख्याहुनि वनवास\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/suralichya-patvadya/", "date_download": "2018-08-18T09:13:47Z", "digest": "sha1:RCF5RCP4JYEVPYA4JWKD6TEWRFKGO237", "length": 8822, "nlines": 165, "source_domain": "www.marathimati.net", "title": "सुरळीच्या पाटवड्या | Suralichya Patvadya", "raw_content": "\n१ मोठी वाटी डाळीचे पीठ (बेसन)\n१ मोठी वाटी आंबट ताक\n१ मोठी वाटी पाणी\nफोडणी व कांदा-खोबर्‍याचे सारण :\n१/२ वाटी ओले खोबरे\n१ मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर\n१ मोठा बारीक चिरलेला कांदा\n१ बारीक चिरुन हिरवी मिरची\n१ पळी तेलाची फोडणी (थंड करुन घालावी)\nजाड बुडाच्या पातेल्यात डाळीचे पीठ, ताक, पाणी, तिखट, मीथ, हिंग, हळद घालुन मिश्रण सारखे करावे. गुठळी राहु देऊ नये. नंतर हे पातेले गॅसवर ठेवून मिश्रण डावेने ढवळत रहावे.\nखाली लागू देऊ नये. मिश्रण दाटसर होत आले की झाकण ठेवून वाफ आणावी. वरील पातेल्यातील १/४ चमचा मिश्रण एका स्टीलच्या थाळीला पसरुन लावून पहावे.\nगार झाल्यावर जर ते उचलले तर चटकन निघाले पाहिजे. ही मिश्रण शिजल्याची खूण आहे. जर असे चटकन निघाले नाही तर पुन्हा एक वाफ आणावी. नंतर मंद गॅसवर मिश्रण ठेवून द्यावे.\nस्टीलची ३-४ ताटे पुसून अगदी कोरडी करावीत. नंतर प्रथम ताटाच्या आतल्या बाजूला मोठा डावभर मिश्रण घालावे व टेबलस्पून ताटाला सारवल्यासारखे करावे. हे काम खूप झटपट व कौशल्याने करावे लागते.\nमिश्रण ताटभर होत आले की हाताला थोडे तेल लावून ताटभर सारवल्यासारखे करावे. नंतर ताट पालथे घालून त्यावर पुन्हा डावभर पीठ घालुन सारवावे. असे सर्व करुन घ्यावे.\nसारणासाठी कांदा चिरावा. सर्व वस्तू एकत्र करुन त्यावर गार फोडणी घालावी. जेवढी ताटे झाली असतील त्याप्रमाणे सारणाचे भाग पाडून एकेका ताटावर सारण पसरवावे. सूरीने कापून अलगद हाताने वड्या गुंडाळाव्यात.\nनवी सोपी कृती :\nसागितलेले साहित्य एकत्र करावे. नंतर हे पातेले साध्या कुकरमध्ये ४० मिनिटे गॅसवर ठेवावे. नंतर डावेने मिश्रण सारखे करावे व ताटावर पसरुन वड्या पाडाव्यात.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in मराठमोळे महाराष्ट्रीयन पदार्थ and tagged ताक, पाककला, पाटवड्या, बेसन, महाराष्ट्रीयन पदार्थ, सुरळीच्या वड्या on ऑक्टोंबर 30, 2012 by स्वाती खंदारे.\n← ३० ऑक्टोबर दिनविशेष बांगडा मसाला →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/kg-pg-education-free-laxmikant-deshmukh-111510", "date_download": "2018-08-18T08:36:36Z", "digest": "sha1:T5R5JWEP23KADGDRT7TSUUDLAMT2D2EO", "length": 12611, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "KG to PG education free laxmikant deshmukh ‘केजी टू पीजी’ शिक्षण मोफत व्हावे | eSakal", "raw_content": "\n‘केजी टू पीजी’ शिक्षण मोफत व्हावे\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nपुणे - ‘‘उच्च शिक्षण महागडे झाल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेले आहे. ‘केजी टू पीजी’ शिक्षण परवडणाऱ्या शुल्कात किंवा मोफत होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्‍यक आहे,’’ असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.\nपुणे - ‘‘उच्च शिक्षण महागडे झाल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेले आहे. ‘केजी टू पीजी’ शिक्षण परवडणाऱ्या शुल्कात किंवा मोफत होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्‍यक आहे,’’ असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.\nमराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांना युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ अमेरिकेची ‘डी. लिट’ ही पदवी नुकतीच मिळाल्याने प्राचार्य भाऊसाहेब जाधव मित्रमंडळ गौरव समितीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी देशमुख बोलत होते. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. पी. सोनावणे, रंजना जाधव, मराठवाडा मित्रमंडळाचे अध्यक्ष शिवाजी गणगे, पुणे विद्यापीठाच्या प्राचार्य फोरमचे अध्यक्ष नंदकुमार निकम, निवृत्त प्रशासकीय अधिकारी श्‍याम देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्‍वंभर चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.\nया वेळी डॉ. निगवेकर म्हणाले, ‘‘देशात आजही कोट्यावधी बालके शिक्षणापासून वंचित राहत आहेत. या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.’’ या वेळी जाधव यांनी सत्काराला उत्तर दिले. तर डॉ. सोनावणे, चौधरी, गणगे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता शेणई यांनी केले.\nशिक्षणाच्या गुणवत्तेचा प्रश्‍नही दिवसेंदिवस गंभीर होत आहे, अशा परिस्थिती गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण परवडणार कसे, हा प्रश्‍न अनुत्तरीत राहत आहे.\n- लक्ष्मीकांत देशमुख, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन.\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nसंग्रामपूर : वाण धरण ६५ टक्के भरले\nसंग्रामपूर : सातपुडा पर्वतामधील तीन जिल्ह्यांसाठी जलसंजीवनी ठरलेले वाण धरण 65 टक्के भरले आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या ...\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून सहाजण जखमी\nबेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने बंगळूरकडे जाणारी व्हीआरएलची आराम बस उलटून चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय...\nचिंचवडमध्ये रविवारी रंगणार महिला प्रेरणा संमेलन\nवाल्हेकरवाडी - स्वयंसिद्धा प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड शहर) आणि प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि. 19 ऑगस्ट) चिंचवड...\nघरकामगार, बांधकाम मजूर महिलांची उपेक्षाच\nजळगाव : दिवसरात्र काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, पण डोक्‍यावर हक्काचं छत नाही...सतत कष्ट करूनही पदरी काहीच न पडल्यामुळे अनेकदा उपवास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/farmers-and-labor-fight-together-vasantdada-sugar-19293", "date_download": "2018-08-18T08:39:58Z", "digest": "sha1:AFSKPM4L3MY3PBCKOOURV3YFY5FHVRJA", "length": 12267, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "farmers and labor to fight together at vasantdada sugar 'वसंतदादा' प्रशासनाविरूद्ध एकत्रित लढण्याचा निर्णय | eSakal", "raw_content": "\n'वसंतदादा' प्रशासनाविरूद्ध एकत्रित लढण्याचा निर्णय\nगुरुवार, 8 डिसेंबर 2016\nसांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कामगार, निवृत्त कामगार, उस पुरवठादार शेतकरी, सभासदांची संयुक्त बैठकीत विविध मागण्यांसाठी यापुढे एकत्रतपणे लढण्याचा निर्णय आज बैठकीत घेतला. कारखान्यावर प्रशासक नेमावा यासह विविध मागण्यांसाठी गुरुवार (ता. 8) आठ दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामकाजादिवशी \"उपोषण' करण्यात येणार आहे.\nशरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय कोले यांच्या उपस्थितीत बैठक झाली. वसंत सुतार, सुनिल फराटे, रावसो दळवी, सुरेश सादरे, एकनाथ कापसे, बाबुराव माळी, बाळासो पाटील, नामदेव जगताप आदी उपस्थित होते.\nसांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कामगार, निवृत्त कामगार, उस पुरवठादार शेतकरी, सभासदांची संयुक्त बैठकीत विविध मागण्यांसाठी यापुढे एकत्रतपणे लढण्याचा निर्णय आज बैठकीत घेतला. कारखान्यावर प्रशासक नेमावा यासह विविध मागण्यांसाठी गुरुवार (ता. 8) आठ दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामकाजादिवशी \"उपोषण' करण्यात येणार आहे.\nशरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय कोले यांच्या उपस्थितीत बैठक झाली. वसंत सुतार, सुनिल फराटे, रावसो दळवी, सुरेश सादरे, एकनाथ कापसे, बाबुराव माळी, बाळासो पाटील, नामदेव जगताप आदी उपस्थित होते.\nसाखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची ऊसबिले, ठेवी अशी सुमारे 90 कोटी व कामगारांचे सन 2005 ते 10 काळातील 36 महिन्यांचा पगार, सन 2016 मधील दहा महिन्यांचा पगार, 2013-14 मधील ओव्हरटाईम, बोनस, जुलै 2015 पासूनची पगारवाढीच्या रकमा आजपर्यंत मिळाल्या नाहीत. 2002 पासून 2016 पर्यंत 1600 कामगार निवृत्त झाले. त्यांची ग्रॅच्युईटी, फंडाच्या रकमा मिळाल्या नाहीत. कारखान्याने 2008 पासून ही देणीही अहवालात दाखवली नाहीत. कारखान्याला लेखापरीक्षण खाते व साखर आयुक्तालयही सहकार्य करीत आहे, अशी टीकाही करण्यात आली.\nसंग्रामपूर : वाण धरण ६५ टक्के भरले\nसंग्रामपूर : सातपुडा पर्वतामधील तीन जिल्ह्यांसाठी जलसंजीवनी ठरलेले वाण धरण 65 टक्के भरले आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या ...\nगिरणा धरण झाले 31 टक्के\nचाळीसगाव : हरणबारी धरणापाठोपाठ गुरुवारी (16 ऑगस्ट) केळझर धरण \"ओव्हर फ्लो' झाले. चणकापूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे त्यातूनही मोठ्या प्रमाणावर...\nआंबोलीला जोराच्या पावसामुळे भातशेतीचे नुकसान\nजुन्नर - ऐतिहासिक दाऱ्या घाटाच्या पायथ्याशी असलेल्या आंबोली ता.जुन्नर येथे गुरुवारी झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले...\nनोकरी ‘सहा’ तासांचीच करावी - अनिल बोकील\nसांगली - भारतीय लोक ज्या वातावरणात राहतात, तेथे तीन ते साडेतीन तासच काम करू शकतात. आठ तास कामाची सक्ती केली जाते. त्याऐवजी नोकरीचे तास सहा करावेत आणि...\nभोकरदनमध्ये नदीत शेतकरी गेला वाहून\nकेदारखेडा (जि. जालना) - भोकरदन तालुक्‍यात गुरुवारी (ता. 16) झालेल्या पावसामुळे गिरिजा नदीला मोठ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/sebi-seeks-detailed-explanations-tata-firms-25151", "date_download": "2018-08-18T08:33:05Z", "digest": "sha1:NIV3MTUNNUDW2E2CI2ODLR5DBCFIEJNW", "length": 10332, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sebi seeks detailed explanations from Tata firms \"सेबी'ने मागविला टाटा समूहाकडून खुलासा | eSakal", "raw_content": "\n\"सेबी'ने मागविला टाटा समूहाकडून खुलासा\nसोमवार, 9 जानेवारी 2017\nसमूहातील काही कंपन्यांमध्ये गैरकारभार आणि \"इनसायडर ट्रेडिंग' झाल्याचा आरोप मिस्त्रींनी केला असून, त्याबाबत \"सेबी'कडे लेखी तक्रार दाखल केली आहे. मिस्त्रींच्या तक्रारीवर \"सेबी'ने टाटा समूहातील काही कंपन्यांची चौकशी सुरू केली आहे.\nनवी दिल्ली - टाटा सन्सचे पदच्युत अध्यक्ष सायरस मिस्त्री आणि उद्योगपती नुस्ली वाडिया यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी भांडवली बाजार नियंत्रक संस्था \"सेबी'ने टाटा समूहातील काही कंपन्यांकडून खुलासा मागवला आहे.\nसमूहातील काही कंपन्यांमध्ये गैरकारभार आणि \"इनसायडर ट्रेडिंग' झाल्याचा आरोप मिस्त्रींनी केला असून, त्याबाबत \"सेबी'कडे लेखी तक्रार दाखल केली आहे. मिस्त्रींच्या तक्रारीवर \"सेबी'ने टाटा समूहातील काही कंपन्यांची चौकशी सुरू केली आहे. गैरव्यवहार आणि इनसायडर ट्रेडिंग प्रकरणी या कंपन्यांनी याआधीच शेअर बाजाराकडे आपले म्हणणे मांडले आहे. यात सध्या तरी गंभीर बाब समोर आलेली नाही मात्र, तरीही \"सेबी'कडूनही खुलासा देण्यास सांगितले आहे.\nबापजी गेले. आज पुन्हा एकदा माझ्या डोक्‍यावरचे वडिलांचे छत्र हरपले. निव्वळ अवर्णनीय दु:खाचा दुसरा आघात आज माझ्यावर झाला आहे. मन एका क्षणात...\nAtal Bihari Vajpayee : ठाकरे कुटुंबाने घेतले वाजपेयींचे अंत्यदर्शन\nमुंबई - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यदर्शनाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे...\nधडपड - शेतकऱ्यांत विश्‍वास निर्माण करण्याची\nसातारा - शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते, हे दाखवून देण्यासाठी युवकाने शेअर फार्मिंगच्या (गटशेती) माध्यमातून खातवळ येथे ४० एकरांत करार शेती करण्याचे...\n'जय विज्ञान'चा उद्‌घोष करणारे अटलजी\nअटलजी ही एक व्यक्ती नव्हती, एक संस्था होती, एक विचार होता. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञानाला प्रोत्साहन देण्याची त्यांची भूमिका नेहेमीच प्रकर्षाने...\nपरभणीत 24 ऑगस्टला होणार कन्हैयाकुमारची सभा\nपरभणी : 'संविधान बचाओ, देश बचाओ' या उपक्रमाअंतर्गत दिल्लीतील विद्यार्थी संघटनेचे नेते कन्हैयाकुमार यांची परभणीत 24 ऑगस्टला तर पाथरीत 25 ऑगस्टला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/new-born-baby-hepatitis-b-sickness-security-municipal-health-department-133543", "date_download": "2018-08-18T08:53:02Z", "digest": "sha1:UKLLKHKC5GMDFUQA63SWVDERQCIJWAY4", "length": 13911, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "new born baby hepatitis-b sickness security municipal health department 2020 पर्यंत मुंबईतील नवजात शिशुंना हेपेटाटीस बीपासून शंभर टक्के रोखणार | eSakal", "raw_content": "\n2020 पर्यंत मुंबईतील नवजात शिशुंना हेपेटाटीस बीपासून शंभर टक्के रोखणार\nगुरुवार, 26 जुलै 2018\nमुंबई - नवजात बालकांना हेपेटायटीस बीची लागण होण्यापासून प्रतिबंध करणारी लस देत शंभर टक्के करुन दाखवणार, पर्यंत मुंबईत हे सकारात्मक चित्र असेल, असा निर्धार पालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.\nमुंबई - नवजात बालकांना हेपेटायटीस बीची लागण होण्यापासून प्रतिबंध करणारी लस देत शंभर टक्के करुन दाखवणार, पर्यंत मुंबईत हे सकारात्मक चित्र असेल, असा निर्धार पालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.\nआज परळ येथील आयटीसी हॉटेलमध्ये नॅशनल लिव्हर फाऊंडेशन आणि द मुंबई ऑब्स्ट्रेटिक एण्ड गायनोलोजिकल सोसायटीच्या विद्यमाने आयोजित कार्यक्रमात उपस्थित पालिका आरोग्य अधिका-यांनी हा निर्धार केला. या कार्यक्रमात प्रमुख पालिका रुग्णालयाचे संचालक व केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ अविनाश सुपे, पालिकेचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ सी एन चिपळूणकर, सहकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ संतोष रेवणकर,\nनॅशनल लिव्हर फाऊंडेशनचे संस्थापक डॉ समीर शाह, मुंबई ऑब्स्ट्रेट्रिक्‍स एण्ड गायनोलोजिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ बिपीन पंडित आदी मान्यवर या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.\nहेपेटायटीस बी हा आजार पूर्णपणे बरा होत नाही परंतु त्याला नक्कीच प्रतिबंध घालता येते. नवजात शिशुंना या आजारापासून वाचवण्यासाठी पालिका आरोग्य विभागाकडून मोफत लस दिली जाते. खासगी रुग्णालयांतही ही लस पालिका मोफत पुरवते. गेल्या काही वर्षांच्या प्रयत्नांतून मुंबईने जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्वद टक्‍क्‍यांहून अधिक रुग्णांना हेपेटायटीस बीचे लस देण्याचे लक्ष पूर्ण केल्याची माहिती प्रमुख पालिका वैद्यकीय रुग्णालयाचे संचालक व केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ अविनाश सुपे यांनी दिली. मुंबईत दर वर्षाला एक लाख पन्नास हजार नवजात बालक जन्म घेतात. त्यात 92 टक्के मुलांना हेपेटायटीस बीची लस दिली जाते. उर्वरित आठ टक्के पूर्ण करण्याचे आपले लक्ष्य असल्याचेही डॉ सुपे म्हणाले.\nगोवंडी, चेंबूर, गोराई आदी भागांत लसीकरणाला मर्यादा येत आहेत. या भागांत जनजागृती गरजेची असल्याचेही ते म्हणाले.\nप्रसूतीपूर्व जन्मलेले बालक, जन्मतःच कमी वजनांच्या बालकांना हेपेटायटीस बीची लस देणे जीवघेणे ठरु शकते म्हणून त्यांना त्वरित लस दिली जात नाही, अशी माहिती नॅशनल लिव्हर फाऊंडेशनचे डॉ समीर शाह यांनी दिली. मात्र हा अडथळाही दूर करता येईल, असा आशावाद पालिकेचे सहकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ संतोष रेवणकर यांनीही दिली.\nबारामती - विद्या प्रतिष्ठानच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पुरस्कार\nबारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nउंड्री - पाचव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजूर ठार\nउंड्री - गुलाम अली नगर गल्ली नं 6 दि.13 ऑगस्ट दु.12.30 वाजता एका निर्माणाधीन इमारतीचे काम सुरू असताना पाचव्या मजल्यावर पडून राजशेखर माशाले (वय 33...\nपिंपळवंडीला मानव-बिबट सहजीवन जनजागृती\nजुन्नर - पिंपळवंडी ता.जुन्नर येथे मानव व बिबट संघर्ष व सहजीवन याविषयी मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती करण्यात आली. जुन्नर वन विभाग तसेच...\nदूध भुकटी उद्योग संकटात ; शेतकऱ्यांना वाढीव दराची प्रतीक्षाच\nसोलापूर : दूध व दुग्धजन्य पदार्थांची देशांतर्गत गरज भागवून शिल्लक दुधापासून भुकटी बनविली जाते. परंतु, सद्यःस्थितीत महाराष्ट्रात 30 हजार टन तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/young-artist-shashank-mahadik-sketch-ganpati-bappa-132933", "date_download": "2018-08-18T08:53:15Z", "digest": "sha1:NCRKYXQ6UMJIC7DD2I22OOLIPA5NOSYN", "length": 13439, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Young artist shashank mahadik sketch Ganpati Bappa चित्रांतून साकारले गणपती बाप्पा | eSakal", "raw_content": "\nचित्रांतून साकारले गणपती बाप्पा\nमंगळवार, 24 जुलै 2018\nपिंपरी - युवा चित्रकार म्हणून जडणघडण होत असलेल्या मुंबई-जोगेश्‍वरी येथील शशांक महाडिक याच्या चित्रांतून ‘गणपती बाप्पा’ हे मोहक रूपात साकारले आहेत. चित्रकलेची कोणतीही परीक्षा दिलेली नसताना पेन्सिल स्केचिंगद्वारे आकर्षक व्यक्तिचित्रे काढण्यात त्याचा हातखंडा आहे.\nपिंपरी - युवा चित्रकार म्हणून जडणघडण होत असलेल्या मुंबई-जोगेश्‍वरी येथील शशांक महाडिक याच्या चित्रांतून ‘गणपती बाप्पा’ हे मोहक रूपात साकारले आहेत. चित्रकलेची कोणतीही परीक्षा दिलेली नसताना पेन्सिल स्केचिंगद्वारे आकर्षक व्यक्तिचित्रे काढण्यात त्याचा हातखंडा आहे.\nअवघ्या २३ वर्षांच्या या युवा चित्रकाराचे बीई ॲटोमोबाईलपर्यंत शिक्षण झाले आहे. चित्रकला, कॅलिग्राफी, हस्तकला हे छंद त्याने जोपासले आहे. स्थिरचित्र, निसर्गचित्र आणि व्यक्तिचित्र अशी सुमारे ७० चित्रे त्याने आत्तापर्यंत काढली आहेत. मात्र, त्याचा सर्वाधिक भर हा व्यक्तिचित्रांवर आहे. बालकांच्या विविध भावमुद्रा टिपणारी चित्रे तो लीलया काढतो. त्याचबरोबर, गणपती बाप्पाची विविध चित्रे त्याने चितारली आहेत. सध्या अच्युत पालव, अजित लोटलीकर यांच्या कॅलिग्राफीच्या (सुलेखन) कार्यशाळा, व्हिडिओमुळे त्याला कॅलिग्राफीचे प्रचंड वेड लागले आहे. त्याचाही सराव सुरू आहे.\nशशांक सांगतो, ‘‘लहानपणापासूनच चित्रकला हा माझ्या आवडीचा विषय. शाळेत असल्यापासून रंग, पेन्सिल यांच्याशी गट्टी जमली. मग जमेल तसं, मिळेल तिथे रेखाटत गेलो. बरीचशी चित्रे गणपतीची रेखाटली. चित्रकलेचे खरे बारकावे, कौशल्य शिकविले अ. भि. गोरेगावकर शाळेतील (गोरेगाव) चित्रकलेच्या शिक्षिका भारती राणे यांनी. सातवीत असताना ‘चित्रमय सावरकर’ चित्रकला स्पर्धेत (२००५) पहिल्यांदा बक्षीस मिळालं. चित्र काढण्याचा सराव करताना होणाऱ्या चुकांतून शिकत गेलो. अभियांत्रिकी महाविद्यालयात असताना वेळ काढून चित्र काढण्याचा सराव सुरू ठेवला. इंटरनेट, सोशल मीडियावरून चित्रांचे संदर्भ घेऊन त्यातून शिकत गेलो.’’\nकुटुंबाची, मित्रांची मिळणारी कौतुकाची थाप ही मला चांगले काम करण्याची प्रेरणा देते. आजही आठवडा, दोन आठवड्यांनी चित्रं काढलं नाही तर अस्वस्थ व्हायला होतं. नुसते चित्रकलेपुरते मर्यादित न राहता मला कला क्षेत्रातही बरेच काही शिकायचे आहे.\n- शशांक महाडिक, चित्रकार\nघरकामगार, बांधकाम मजूर महिलांची उपेक्षाच\nजळगाव : दिवसरात्र काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, पण डोक्‍यावर हक्काचं छत नाही...सतत कष्ट करूनही पदरी काहीच न पडल्यामुळे अनेकदा उपवास...\nडिजिटायझेशन'ने दुर्मिळ ग्रंथही चिरकाल \nजळगाव ः पुस्तकांचा खजिना सांभाळणाऱ्या अनेक वाचनालयांना शतकोत्तरी परंपरा लाभलेली आहे. परंतु काळानुरूप ग्रंथालयांनी तंत्रज्ञानाशी जुळवून, त्या दिशेने...\nविद्यार्थ्यांची जबाबदारी शिक्षकांबरोबर पालकांचीही - प्राध्यापक पंकज गावडे\nनवी सांगवी (पुणे) - \" चारित्र्यवान साने गुरूजींचे जीवन हे त्यांच्या शिक्षकांबरोबर त्यांची वात्सल्यसिंधु आईच्या संस्कारामुळे घडले, त्यामुळे...\nसमस्या सोडवण्यासाठी नाशिकला भरणार शिक्षकांचा दरबार\nयेवला - शिक्षकांच्या विविध रखडलेल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी नाशिकमध्ये विभागातील शिक्षकांचा शिक्षक दरबार गुरुवारी (ता.२३) आयोजित करण्यात आला...\nथ्री डी कोलाजमधून साकारले शिवचरित्र\nइचलकरंजी - जिद्द आणि चिकाटी ठेवत तब्बल ७ वर्षे परिश्रम घेत, येथील डॉ. ज्योती दशावतार बडे यांनी थ्री डी कोलाजमधून अवघे शिवचरित्र साकारले आहे. हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/celebrities/sonali-kulkarni", "date_download": "2018-08-18T08:16:11Z", "digest": "sha1:4R6EN2UEHOPKG5V764FZWUPXA5W4MH5A", "length": 2251, "nlines": 48, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Sonali Kulkarni | Marathi Dhamaal", "raw_content": "\nउंची: 5 फूट 3 इंच (5'3\")\nजन्म ठिकाण: पुणे, महाराष्ट्र, भारत\nजो़डीदाराचे नाव: नचिकेत पंतवैद्य\nशुगर सॉल्ट आणि प्रेम\nअगं बाई अरेच्चा २\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation शाहीद कपूरचा भाऊ साकारणार का ‘परश्या’ची भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://punerispeaks.com/fuel-prices-hike-strike-in-brazil/", "date_download": "2018-08-18T08:40:38Z", "digest": "sha1:HKPTTUU7XJLSGWO7R2P7UZDXLZYBJ5BC", "length": 7038, "nlines": 91, "source_domain": "punerispeaks.com", "title": "इंधन दरवाढीला विरोध करण्यासाठी ब्राझीलच्या ट्रकवाल्यांनी लढवली नामी शक्कल, सरकारची आणीबाणीची घोषणा", "raw_content": "\nइंधन दरवाढीला विरोध करण्यासाठी ब्राझीलच्या ट्रकवाल्यांनी लढवली नामी शक्कल, सरकारची आणीबाणीची घोषणा\nब्राझील मधील साओ पावलो शहरात 25 मे रोजी आणीबाणीची स्थिती घोषित करण्यात आली आहे. इंधन दरवाढीला विरोध करण्यासाठी ट्रकधारकांनी ब्राझीलच्या महामार्गांवर पाचव्या दिवशी रस्तारोखो केला आहे.\nआणीबाणीच्या परिस्थितीमुळे शहरातील पायाभूत सुविधा आणि आपत्कालीन सेवांकरिता चालणारे इंधन यासारख्या वस्तू जप्त करण्यात सरकारला परवानगी मिळणार आहे. ट्रक आंदोलनामुळे देशभरातील उपभोक्ता वस्तूंची लक्षणीय टंचाई उद्भवली आहे. ब्राझीलच्या सरकारने शुक्रवारी लष्करी अधिकार्यांना ट्रकवाल्यांनी विरोध करून महामार्गावरील केलेल्या अडथळ्यांना दूर करण्यासाठी पाचारण करण्याची मंजुरी दिली.\nट्रकवाल्यांनी केलेल्या आंदोलनामुळे सर्व रस्ते बंद होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे.\nभारतातील करपद्धत ब्राझीलशी मिळतीजुळती असून सरकारने इंधनावर जवळपास ५०% कर लावला आहे. हा कर कमी करण्यासाठी सर्व ट्रकवाल्यांनी दरवाढीचा विरोध केला. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून सरकार १०% पर्यंत दर कमी करण्यास तयार झाली आहे.\nअपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.\nपेट्रोल डिझेल च्या किमती भडकणार, ४ ₹ पर्यंत दरवाढ होण्याची शक्यता\nरशीद खान याला नागरिकत्व देण्यासाठी सुषमा स्वराज यांना भारतीयांनी विचारले, त्यांनी दिले उत्तर…\nभाबड प्रेम: मधुरा आणि चंद्रविलास याचं\nPrevious articleरशीद खान याला नागरिकत्व देण्यासाठी सुषमा स्वराज यांना भारतीयांनी विचारले, त्यांनी दिले उत्तर…\nNext articleIPL विजेता टीम ला मिळणार एवढे पैसे, हरणारी टीम सुद्धा होणार करोडपती\nAsian Games 2018: आशियाई क्रीडा स्पर्धा वेळापत्रक, प्रक्षेपण, कबड्डी संघ वेळापत्रक\nपिंपरीत प्रियकराने ‘Shivde, I Am Sorry’ चे ३०० फलक लावले, कोण आहे शिवडे\nअटल बिहारी वाजपेयी माहिती, अटल बिहारी वाजपेयी विशेष , अटल बिहारी वाजपेयी मराठी, अटल बिहारी वाजपेयी कविता\nपुणे तिथे काय उणे: देशात राहण्यासाठी पुणे शहर अव्वल स्थानी\nआरक्षण – एक शोधनिबंध | आरक्षण माहिती | आरक्षण म्हणजे काय\nRaj Thackeray VS Ajit Pawar: पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळ्यात एकमेकांवर टीका, वॉटरकप 2018 विजेते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/655/Raghuveer-Aaj-Ghari-Yenar.php", "date_download": "2018-08-18T08:37:47Z", "digest": "sha1:YAVVW56YIXQE7RXCC4SVAF5JHFWV56B5", "length": 9282, "nlines": 142, "source_domain": "www.gadima.com", "title": "Raghuveer Aaj Ghari Yenar -: रघुवीर आज घरी येणार : NonFilmy (Ga.Di.Madgulkar|Sudha Madgaonkar|Gajanan Watve) | Marathi Song", "raw_content": "\nअंत उन्नतीचा पतनीं होइ या जगांत\nसर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nरघुवीर आज घरी येणार\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nरघुवीर आज घरी येणार\nकमलफुलांच्या पायघड्यांवर कमलपदे पडणार\nकमलांकित या शय्येवरती कमलनयन मिटणार\nकमलेपरी मी बसून पदांशी कमलचरण चुरणार\nकमलकळ्यांचे अधर प्रभूचे अधरांनी टिपणार\nगदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'\nभाळी अर्धचंद्र माथी शुभ्रगंगा\nआश्रम की हरिचे हे गोकुळ\nरघूवीर आज घरी येणार\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=269&Itemid=461&limitstart=1", "date_download": "2018-08-18T08:14:17Z", "digest": "sha1:J7GSSWETLSOMWVANQTH35EBHMI76NWVR", "length": 6738, "nlines": 45, "source_domain": "saneguruji.net", "title": "मेंग चियांग", "raw_content": "शनिवार, आँगस्ट 18, 2018\nत्या लहानशा देवळात ती बसली. देवासमोर अश्रू ढाळित बसली, ''देवा, अश्रूंनी तुझे मंदिर मलिन करित आहे म्हणून रागावू नको. मुलीला क्षमा कर. मी दुर्दैवी आहे. थंडीवा-यात तुझ्या पायी निवारा; उबारा.''\nतेथे जागा झाडून दात शिवशिवत ती झोपली. कोठली झोप तिच्या फाटक्या वस्त्रांतून वारा घुसत ओता. ती गारठली. आकाशात अष्टमीचा चंद्र मावळत होता. ती देवाला म्हणाली, ''देवा, माझ्या पतीला स्वप्न पाड. मी गरम कपडे घेऊन येत आहे. सांग, त्याला धीर येईल. माझ्या दया कर. वीस वर्षेहि माझ्या वयाला नाहीत तिच्या फाटक्या वस्त्रांतून वारा घुसत ओता. ती गारठली. आकाशात अष्टमीचा चंद्र मावळत होता. ती देवाला म्हणाली, ''देवा, माझ्या पतीला स्वप्न पाड. मी गरम कपडे घेऊन येत आहे. सांग, त्याला धीर येईल. माझ्या दया कर. वीस वर्षेहि माझ्या वयाला नाहीत लहान मी. परंतु जाईन त्याला शोधीत.''\nगालांवरून अश्रु घळघळले. ती पुन्हा जुडी करून पडली. स्वप्नात अस्थिपंजर पतीला ती बघते.\n''नाथ, या, या,'' असे म्हणत त्याला ती हृदयाशीं धरू बघते, तुम्हांला ऊब देतें म्हणते.\nबाहेर सों, सों वारा करतो. तिला जाग येते. अनंत तारे चमचम करीत असतात. सभोवती पृथ्वी धुक्यांत वेढलेली. हे स्वप्न दुर्दैवाचे सूचक का\nतो स्वप्नात म्हणाला, ''माझी मूठभर हाडे, माझी माती, हीच तुझ्या अनंत श्रमांची भरपाई, दुसरे काय तुला मिळणार\nमाझे विचार भरकटत गेले असतील. ते स्वप्न प्रचंड नद्या नि उंच पर्वत यांवरून येत होते. त्यामुळे ते अस्ताव्यस्त झाले असावे. मी का त्याला मातीच्या खाली पाहीन हे का माझ्या नशिबी असेल हे का माझ्या नशिबी असेल निदान त्याच्याजवळ मीहि पडेन. हें का कमी\nउजाडले. धुके पडून सारे ओलसर आहे. कावळे हिंडू फिरू लागले. देवाला नमस्कारून ती निघाली. हृदयांत आशा-निराशा. म्हणाली, ''किती संकटे असोत, कष्ट असोत, पतिपत्नीचे ऐक्य - त्याची कसोटी आहे.''\nदंवाने तिचे वक्ष:स्थळ ओले झाले आहे आणि अश्रुंनीही. कठोर वारा तिला मिठी मारीत आहे. ती थरथरत आहे. पतीला हांक मारून म्हणते, ''कोठल्या बाजूला वळू, कोठें तुला पाहूं कधी पुन्हा माझ्या केसांत फुलें घालशील कधी पुन्हा माझ्या केसांत फुलें घालशील माझ्या कानांत कर्णफुलें घालशील माझ्या कानांत कर्णफुलें घालशील आपण रात्री चांदण्यांत फुलबागेत सारंगी वाजवित होतों. उत्तरेच्या भिंतीकडे मी येत आहे. भेटशील का आपण रात्री चांदण्यांत फुलबागेत सारंगी वाजवित होतों. उत्तरेच्या भिंतीकडे मी येत आहे. भेटशील का पुन्हा घरी जाऊन आपण सायंकाळचे जेवण करू का पुन्हा घरी जाऊन आपण सायंकाळचे जेवण करू का जिन्यांतून दोघे बरोबर जाऊं का जिन्यांतून दोघे बरोबर जाऊं का नाथ, पूर्वजन्मी आपले काय पाप घडले कीं हें भोगायला लागावें नाथ, पूर्वजन्मी आपले काय पाप घडले कीं हें भोगायला लागावें तळवे फाटले रे. सुकलेल्या फुलागत माझी दशा.'' वाटेंत कधी प्रचंड जंगले, प्रचंड वाळवंटे, प्रचंड नद्या, प्रचंड दर्या. कधी रस्ता नसे. कधी चार पावलें उमटलेलीं दिसत. कधीं झोपडी आढळे. कुत्रा भुंके. कोंबडा आरवतांना कानावर येई. कधी रस्त्यांत खानावळ लागे. तेथे चार घांस खाई. तिच्याकडून बघून खानावळवाला म्हणे, ''थोरा मोठयांची दिसते. दृष्टीत दु:ख आहे. परंतु किती सुंदर आहे ही नाही तळवे फाटले रे. सुकलेल्या फुलागत माझी दशा.'' वाटेंत कधी प्रचंड जंगले, प्रचंड वाळवंटे, प्रचंड नद्या, प्रचंड दर्या. कधी रस्ता नसे. कधी चार पावलें उमटलेलीं दिसत. कधीं झोपडी आढळे. कुत्रा भुंके. कोंबडा आरवतांना कानावर येई. कधी रस्त्यांत खानावळ लागे. तेथे चार घांस खाई. तिच्याकडून बघून खानावळवाला म्हणे, ''थोरा मोठयांची दिसते. दृष्टीत दु:ख आहे. परंतु किती सुंदर आहे ही नाही\nमेंग चियांग व इतर गोष्टी\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.manashakti.org/index.php?q=story/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E2%80%98%E0%A4%89%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E2%80%98-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-08-18T09:18:05Z", "digest": "sha1:QJSCUJVDNYH6NJTZRSJ3RQKQEKA5IYWU", "length": 8825, "nlines": 94, "source_domain": "www.manashakti.org", "title": "दोन ‘उभ्या‘ समाध्या | Manashakti Research Centre", "raw_content": "\nयेथे सातत्यपूर्ण मनःशांती मिळवण्याच्या सोप्या व व्यावहारीक उपायांची माहिती आहे.\nएक लाख विरुध्द चाळीस.\nशिखांच्या बहादुरीचा दहावा चमत्कार घेरला गेला. चहुबाजूने घेरला गेला. आनंदपूरच्या ह्या वेढ्यात आलीखान, दिलावरखान, मागे हटले. पण रजपूत आणि मोगल मिळून लाख तलवारी समोर असताना, गुरू गोविंद-सिंग आनंदपूर किती लढवणार तेव्हा रात्रीच्या बोगद्यातून त्याने शत्रूला चकवले, आपली माता, पत्नी आणि दोन मुले, जोरावरसिंग-फत्तेसिंग यांना गंगाराम या सेवकाबरोबर दूर धाडून दिले. मग तो स्वत: चमकौरच्या किल्ल्यात अजितसिंग आणि झुंजारसिंग या दोन उरलेल्या वंशाधारांना घेऊन, संकटाच्या सागरात एकटा खडा राहिला. आणि तिथेत तो विषम सामना सुरू झाला. एक लाख विरुध्द चाळीस.\nअजितसिंग आणि झुंजारसिंग, त्वेषाचे हत्तीबळ घेऊन पुढे घुसले. अभिमन्यूचे ते वारस, वीरत्वाची पराकाष्ठा करीत, मोगलांशी मातब्बर झुंज करते झाले.\nतलवारीच्या विजा झाल्या. शूरत्वाने संख्या खाऊन टाकली. वीरत्वाचा तो अंगारवट एवढा भव्य होता की त्याच्या आडोशाने, गुरू गोविंदसिंग शत्रूचा डोळा चुकवून, किल्ल्याबाहेर केव्हा पडले ते कळलेच नाही.\nशिखांच्या या शेवटच्या गुरूवरचे संकट चौफेर धावून येत होते. ज्या काकाडे - गंगारामकडे आपले कुटुंब आणि दोन मुलगे गुरू गोविंदसिंगांनी सोपवले होते, त्यानेच विश्र्वासघात केला. सरहिंदचा सुभेदार वझीरखान याला कळवले, की गुरू गोविंदसिंगांची ही वंशशाखा त्याने ताब्यात घ्यावी. ती वंशशाखा म्हणजे मेंढरे नव्हती. ते मरुताचे वारस होते. पराक्रमाचे पुत्र होते. पंचनद्यांचे पाणी प्यालेले शौर्यशिष्य होते.\nवझीरखानने गळ्याजवळ तलवारीचे पाते टेकवून हुकूम सोडला, “धर्म बदला, तर तलवार मागे घेतो. “\nएक काळी कभिन्न भिंत मागे उभी होती. तिच्यामध्ये कोरलेले दोन कोनाडे, दोन पुत्रांच्या पडछाया झेलीत उभे होते. पाहाणाऱ्या आया व्याकुळल्या होत्या. शत्रू शेफारले होते. आणि मित्र उरलेच नव्हते.\nवाघाच्या दोन बच्च्यांनी क्षणमात्र एकमेकांकडे पाहिले. उत्तर काय द्यावे याबद्दल दोघांच्याही मनता संशय नव्हता. बेमुर्वत उत्तर देण्याचा हक्क दोघांनाही हवा होता. पण उत्तर एकच होते, “आम्ही गुरू गोविंदसिंगाचे बच्चे आहोत. मरण क्षुद्र आहे. आमच्या रक्ताच्या थेंबागणिक सूडाची फुलं, मानवी देह धारण करतील. आणि तुम्हा मारणाऱ्यांना मारतील. “\nवझीरखान या उत्तराने चेवून गेला. मुंडके एका झटक्यात उडवून या कार्ट्यांना नाहीसे करावे, असे क्षणभर त्याला वाटले. पण त्याने तलवार मागे घेतली. मागे उभे असलेल्या कभिन्न सहकाऱ्यांना त्याने हुकूम दिला, “त्यांना मागल्या कोनाड्यात चेचा. कोनाडे लिंपून टाका. याना कणाकणाने मरू दे. उध्दटपणा असाच उखडला गेला पाहिजे. “\nदोन शेर आत लोटले गेले. पायापासून कणाकणाने लिंपले गेले. बेंबीच्या देठापासून धर्मघोष उच्चारला जात होता. बेंबी दबली. छाती दबली. फुफ्फुसे दबली. गळा चुनखडीने चेपला. तोंडात माती पडली. डोळ्यावर ओल्या वाळूचे शिपकारे आले. प्राणवायू नेणारे नाकाचे नळ बंद झाले. आणि अखेर डोळेही बंद झाले.\nअसले वीरमरण, नव्या न्यायाची फुंकर जन्माला घालते. प्रत्येक क्रूर अन्याय, आपला भावी शत्रू निर्माण करतो. वझीरखानाने गुरू गोविंदपुत्र नाहीसे केले नाहीत, तर त्यानं स्वत:चा छेद घेणारा भावी बंदा वैरागी जन्माला घातला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-18T07:59:30Z", "digest": "sha1:PTK7RAWEREJQBBRIIRNU6ZYDSHK3XHI4", "length": 8778, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मालवाहतुकीसाठी टनांची मर्यादा वाढविली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमालवाहतुकीसाठी टनांची मर्यादा वाढविली\nपाठपुराव्याचे यश : केंद्राचे परिपत्रक आता राज्यानेही स्वीकारले\nपुणे, दि. 4 – ट्रकमधून मालवाहतुकीसाठी आवश्‍यक टनांची मर्यादा आता वाढविण्यात आली आहे. त्यामुळे मालवाहतूकदारांना त्याचा फायदा होणार असून जादा माल वाहून नेणे सुलभ होणार आहे त्याचबरोबर डिझेलचीही बचत होणार आहे.\nगेल्या महिन्यात माल वाहतूकदारांनी विविध मागण्यांसाठी सहा दिवस देशव्यापी संप पुकारला. यावेळी मालवाहतूकदारांच्या विविध मागण्या मान्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यामध्ये ट्रक मधून मालवाहतूक करण्यासाठी आवश्‍यक असणारी टनांची मर्यादा वाढविण्यात यावी, अशीही मागणी होती. याची तातडीने दखल घेत केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने मालवाहतुकीत टनांची मर्यादा वाढविल्याचे परिपत्रक काढले. दरम्यान, याबाबत राज्य शासनाने आतापर्यंत आदेश काढला नव्हता. मालवाहतूकदारांनी कळविल्यानंतर आता राज्य शासनाने केंद्राच्या नवीन परिपत्रकाचा स्वीकार केला आहे. ही मर्यादा वाढविल्याने त्याचा फायदा मालवाहतूकदारांना होणार आहे. शिवाय आर्थिक बचत आणि पोलिसांकडून होणारी अडवणूक थांबणार आहे.\n– टू-टायर ट्रकसाठी 16 टनांची मर्यादा वाढवून आता 18.5 टन\n– थ्री-टायर ट्रकसाठी 25 टनांची मर्यादा वाढवून 28 टन\n– छोट्या कंटनेरची 44 टनांची मर्यादा 49 टन.\n– मोठ्या कंटेनरची 49 टनांची मर्यादा आता 55 टन.\nशहरांतर्गत ज्या टुरिस्ट टॅक्‍सी धावतात, त्या चालकांना यापुढे बॅचची गरज लागणार नाही. या टॅक्‍सी चालकांना पूर्वी परवाना नूतनीकरण करताना आरटीओकडून बॅच घेणे बंधनकारक होते. गेल्या आठवड्यात राज्य शासनाबरोबर वाहतूक व टॅक्‍सी चालक संघटनांच्या झालेल्या बैठकीत बॅचची अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे याबाबतचा “जीआर’ लवकरच काढण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.\nगेल्या महिन्यात आम्ही जो संप केला, त्यावळी ही मागणी केली होती. केंद्र शासनाने तातडीने त्याला मान्यता देऊन परिपत्रकही काढले, पण राज्य शासनाने दखल घेतली नव्हती. त्यामुळे आम्ही जाणीव करुन दिल्यानंतर त्यांनी या परिपत्रकाला मान्यता दिली आहे. त्याचा फायदा मालवाहतूकदारांना होणार आहे.\n– बाबा शिंदे, सदस्य, ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट असोसिएशन\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचाकण हिंसाचाराप्रकणी आणखी 12 जणांना अटक\nNext articleनारायणगावमध्ये रुरर्बन योजना राबविणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/jwariche-dhapate/", "date_download": "2018-08-18T09:12:15Z", "digest": "sha1:B6S372ONO7MTCTZNZOOLH76MVZKANAEY", "length": 5979, "nlines": 153, "source_domain": "www.marathimati.net", "title": "ज्वारीचे धपाटे | Jwariche Dhapate", "raw_content": "\n३ वाट्या ज्वारी पीठ\n१ वाटी कांदा किसून\n१ टी स्पून लसूण\n१ टे. स्पू. प्रत्येकी दाणेकूट व तीळकूट\nज्वारीचे पीठ चाळून घ्या. तेल सोडून बाकी सर्व साहित्य एकत्र मळावे.\nपातळ भाकरीप्रमाणे थापावे. गॅसवर तवा गरम करत ठेवावा.\nतवा तापल्यावर ही धपाटी तेल टाकून लालसर होईपर्यंत भाजावे. तयार आहे गरम गरम धपाटी.. दही किंवा चटणी सोबत खावीत.\nही धपाटी ७-८ दिवस टिकतात, आणि ही प्रवासासाठी अधिक उपयुक्त.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in न्याहारी and tagged ज्वारी, तीळकूट, दाणेकूट, धपाटे, न्याहारी, पाककला on सप्टेंबर 17, 2012 by स्वाती खंदारे.\n← १७ सप्टेंबर दिनविशेष व्हेज ब्रेड →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2018-08-18T09:07:17Z", "digest": "sha1:7I4JOD7LJBOWLFK3MQF474UUYBCV264M", "length": 4384, "nlines": 65, "source_domain": "m4marathi.com", "title": "स्मरणशक्ती वाढीसाठी | m4marathi", "raw_content": "\n१) अगस्त्यच्या बियांची पूड तीन ग्रॅम ते दहा ग्रॅमपयर्ंत गाईच्या धरोष्ण २५0 ग्रॅम दुधासोबत सकाळ-संध्याकाळ काही दिवसांपयर्ंत घेतल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.\n२) शंखपुष्पीची ३-६ ग्रॅम पूड मधात घालून चाटावी आणि वरून दूध प्यावे. याच्या सेवनाने बुद्धीचा योग्य विकास होतो.\n३) ३-६ ग्रॅम शंखपुष्पी पूड साखर आणि दुधाबरोबर नेहमी सकाळी घेतल्याने स्मरणशक्ती वाढते.\n४) शंखपुष्पी २-४ ग्रॅम आणि वचा १ ग्रॅम पूड मुलांना दिल्याने खूपच बुद्धिमान आणि शहाणे होतात.\n५) सकाळी शंखपुष्पीचे थोडे पाणी घालून रस काढता येते. शुद्ध रस १0-२0 मिलिग्रॅम किंवा २-४ ग्रॅम पूड मध, तूप आणि साखरेबरोबर सहा महिन्यांपयर्ंत सेवन करीत राहिल्याने स्मरणशक्ती आणि बुद्धीत वाढ होते.\n६) दूध, तूप किंवा पाण्यासोबत वचाच्या खोडीची पूड २५0 मिलिग्रॅमच्या प्रमाणात दिवसातून दोन-तीन वेळा एका वर्षापयर्ंत किंवा किमान एक महिन्यापयर्ंत घेतल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.\n७) १0 ग्रॅम वचा पूड २५0 ग्रॅम खांडसरीसोबत पाक करून रोज १0 ग्रॅम सकाळ-संध्याकाळ खाण्याने विसरण्याची सवय दूर होते.\nमानवी आरोग्यासाठी फायदेशीर दोन उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/january-25/", "date_download": "2018-08-18T09:11:05Z", "digest": "sha1:NJ2CGMHSSAOJ3OMLVDAV47TNOCE2OFUD", "length": 7293, "nlines": 152, "source_domain": "www.marathimati.net", "title": "२५ जानेवारी दिनविशेष | January 25", "raw_content": "\n१९८२ : विनोबा भावे यांना ’भारतरत्न’ पदवी प्रदान\n१८७४ : चिपळूणकरांच्या ’निबंधमाला’ मासिकाचा प्रारंभ झाला.\n१९७१ : हिमाचलला राज्याला दर्जा देण्यात आला.\n१९८८ : पृथ्वी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.\n१९९१ : मोरारजी देसाई यांना ‘भारतरत्न’ हा पुरस्कार देण्यात आला.\n२००४ : लेखिका अमृता प्रीतम, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि माजी सरन्यायाधीश एम.एन. वेंकटचलय्या यांना पद्म विभूषण किताब जाहीर. तसेच दिग्दर्शक गुलजार, न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी, जपानचे पंतप्रधान योशिरो मोरी, पत्रकार एम.व्ही. कामत, व्हायोलिनवादक एन. राजम यांना पद्मभूषण किताब जाहीर.\n२००१ : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईवाझ उस्ताद बिस्मिल्ला खॉं यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर.\n१६६५ : सोनोपंत डबीरांचे निधन\n१९८ : लक्ष्मणशास्त्री दाते, सोलापूरचे पंचांगकर्ते.\n२००१ : विजयाराजे शिंदे, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in दिनविशेष and tagged जन्म, ठळक घटना, दिनविशेष, मृत्यू, २५ जानेवारी on जानेवारी 25, 2013 by प्रशासक.\n← २४ जानेवारी दिनविशेष २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/hand-blender/top-10-life-crystal+hand-blender-price-list.html", "date_download": "2018-08-18T08:10:37Z", "digest": "sha1:F3Z4OETQTSD6CYFADU6R4KW2KLKJZJVF", "length": 14262, "nlines": 398, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 लिफे क्रिस्टल हॅन्ड ब्लेंडर | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 लिफे क्रिस्टल हॅन्ड ब्लेंडर Indiaकिंमत\nशीर्ष 10 लिफे क्रिस्टल हॅन्ड ब्लेंडर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 लिफे क्रिस्टल हॅन्ड ब्लेंडर म्हणून 18 Aug 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग लिफे क्रिस्टल हॅन्ड ब्लेंडर India मध्ये लिफे क्रिस्टल रेगुलर हॅन्ड ब्लेंडर Rs. 795 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nशीर्ष 10लिफे क्रिस्टल हॅन्ड ब्लेंडर\nताज्यालिफे क्रिस्टल हॅन्ड ब्लेंडर\nलिफे क्रिस्टल रेगुलर हॅन्ड ब्लेंडर\nलिफे क्रिस्टल द 101 200 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 W\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF/%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A8.php", "date_download": "2018-08-18T09:08:09Z", "digest": "sha1:MEKYEZY75KJD7RH2PAC7GUSUVXNS554L", "length": 66839, "nlines": 1228, "source_domain": "tarunbharat.org", "title": "१० चे नाणे स्वीकारण्यास नकार, २०० रु.चा दंड | Tarun Bharat", "raw_content": "\nवीर संघवी, ज्येष्ठ पत्रकार\nउजव्या विचारसरणीला एक मंच उपलब्ध होईल म्हणून पुद्दुचेरी साहित्य उत्सव रद्द करण्याची डाव्यांची मागणी विचित्र...\nप्रशांत उमराव, वकील, सर्वोच्च न्यायालय\nमेरठमध्ये हेलिकॉप्टरमधून शिवभक्त कावडियांवर फुलांचा वर्षाव करणारे मेरठ भागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांना...\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळात एकाच दिवशी शंभर बळी\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nआयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ\nअजित वाडेकर यांचे निधन\nकेरळमध्ये पावसाचे ७७ बळी; १८ हजार बेघर\nवीर संघवी, ज्येष्ठ पत्रकार\nAll अर्थ कृषी नागरी न्यायालय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nआयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ\nअजित वाडेकर यांचे निधन\nसीआरपीएफला सर्वाधिक शौर्य पदके\nमहाराष्ट्राला ५१ पोलिस पदके\nहवाई दल जवानाच्या वेषात अतिरेकी\nराजीव गांधींनीच नाकारला होता दलितांचा हक्क\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nरस्ता सुरक्षा विषय अभ्यासक्रमात असावा\nडिजिटल व्यवहारांवर २० टक्के कॅशबॅक\nघर, वाहनकर्ज महागले; व्याजदरात ०.२५ टक्क्यांची वाढ\nमहसूल वाढल्याने जीएसटी घटणार\nनिर्देशांक नव्या विक्रमी उच्चांकावर\n‘डिमांड ड्राफ्ट’च्या नियमात बदल\nडॉलरसमोर रुपया सक्षम, मोदी सरकार धैर्यवान\nदेशभर आज जीएसटी दिवस पाळणार\nआर्थिक सल्लागार भारतीय मूल्ये जोपासणारा असावा\nसरकारी बँकांमध्ये लोकांचा पैसा सुरक्षित\nनागरिकांना प्रामाणिकपणे कर भरण्याची विनंती\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nविदर्भ, मराठवाड्यातील आठ सिंचन प्रकल्पांना केंद्राची मदत\nयंदा ९७ टक्के पाऊस\nहमीभावात दीडपट वाढ होणारच\nशेतीपर्यंत पाणी नेण्याची गरज : नितीन गडकरी\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nआयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ\nअजित वाडेकर यांचे निधन\nसीआरपीएफला सर्वाधिक शौर्य पदके\nमहाराष्ट्राला ५१ पोलिस पदके\nहवाई दल जवानाच्या वेषात अतिरेकी\nराजीव गांधींनीच नाकारला होता दलितांचा हक्क\nरस्ता सुरक्षा विषय अभ्यासक्रमात असावा\nछत्तीसगडचे राज्यपाल बलरामजी दास टंडन यांचे निधन\nउच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र\nआंदोलनात कोट्यवधींची संपत्ती नष्ट होणे भीषणच\nराजीव गांधींच्या मारेकर्‍यांना मुक्त करण्यास केंद्राचा नकार\nबार डान्समध्ये अश्‍लील काय\nनॅशनल हेरॉल्ड प्रकरणी राहुल गांधींना दिलासा नाही\nक्रमांक ३ वरच न्या. जोसेफ यांचा शपथविधी\nजम्मू-काश्मीरच्या कलम ३५-ए वर उद्या सुनावणी\nतीन न्यायमूर्तींची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती\nन्यायाधीशपदी नातेवाईकांच्या नियुक्तीला चाप लागणार\nपीडित बालकांच्या कुठल्याही छायाचित्राला प्रसिद्धी नको\nशबरीमलात महिलांनाही प्रवेशाचा अधिकार\nपंतप्रधान मोदींनी दिल्या इम्रान खान यांना शुभेच्छा\nट्रम्प यांना प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे निमंत्रण\nकाश्मीरची बदनामी करणार्‍या रिपोर्टमागे पाकिस्तानचा हात\nकोरियन द्वीपकल्पातील शांतता प्रक्रियेत भारताचा सहभाग\nभारत घेणार रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली\nसेशेल्समध्ये भारत उभारणार नाविक तळ\nऑगस्टावेस्टलँड : दलालाचे प्रत्यार्पण करण्यास इटलीचा नकार\nराष्ट्रपती तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना\nभारत-ब्रिटनमध्ये होणार प्रत्यार्पण करार\nबांगलादेश परत घेणार आपले ३३ घुसखोर\nइराणवरील बंधनांना भारताचा पाठिंबा नाही\nवाटले नव्हते, ही व्यक्ती पंतप्रधान होईल\nपंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा नाही : शरद पवार\nघुसखोरांचे आदरातिथ्य करायचे का\nएक राष्ट्र, एक निवडणुकीला काँग्रेसचा विरोध\nमोदी सरकारविरुद्ध आंदोलन उभारणार\nअमित शाह महिन्यातून तीन दिवस बंगाल मुक्कामी…\n१७ विरोधी पक्षांना हवी मतपत्रिका\n…तर भारतात रक्ताचे पाट वाहतील\nकाँग्रेसने मान्य केला बोफोर्स घोटाळा\nखटल्याच्या भीतीने राहुल यांचे ते भाषणच काढले\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\nबुलेट ट्रेनसाठी बीईएमएल बनवणार सुटे भाग\n‘बुल’ उधळला: विक्रमी उच्चांकावर विराजमान\nकाँग्रेसच्या भीतीने हादरला होता शेअर बाजार\nभारती एअरटेल, पेमेंट बँकेचा ईकेवायसी परवाना रद्द\nदूरसंचार क्षेत्रात ७५ हजार कर्मचार्‍यांना नारळ\nऐतिहासिक… निर्देशांक ३३ हजारी\nगुंतवणूकदार २५ लाख कोटींनी मालामाल\nरजनीशकुमार स्टेट बँकेचे नवे अध्यक्ष\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nभारतातच तयार होणार सुपर हॉर्नेट\nआयआरएनएसएस-१ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nनेव्हिगेशनल उपग्रहाचे उद्या प्रक्षेपण\n‘जी-सॅट-६ ए’ चे यशस्वी प्रक्षेपण\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nसंरक्षण मंत्रालयाकडून व्यवहार नाही\nसीमेजवळ तैनात होणार चिनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॉकेट\nलष्कराला मिळणार ४०० आधुनिक तोफा\nभीष्म व अजेय रणगाड्यांना स्वदेशी इंजीन\nसीआरपीएफ जवानांना नवे बुलेट प्रूफ जॅकेट\nइसिसचा अतिरेकी अडकला गुप्तचर यंत्रणेच्या जाळ्यात\nसौराष्ट्र सीमेवर पाकची लढाऊ विमाने\nकोणत्याही आव्हानासाठी लष्कर सज्ज\nअग्नी-५ लवकरच लष्कराच्या शस्त्रागारात\nजवानांना १० हजार रुपये कापड भत्ता\nसर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ आला समोर\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nरोहिंग्या निर्वासित नसून, बेकायदेशीर घुसखोरच : किरेन…\n६१,१६४ किमी महामार्गाची कामे सुरू\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान :…\nस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\nनोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन\nपाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात\n२१ हजारांपेक्षा जास्त भारतीयांचे अमेरिकेत अनधिकृत वास्तव्य\nइराणविरोधात अमेरिकेचे एकतर्फी कठोर फेरनिर्बंध\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान :…\nस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\nनिवडणूक नियमाचे उल्लंघन, इम्रान खान यांचा लेखी…\nइम्रान खान यांना खासदारकीची शपथ घ्यायला सशर्त…\n६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू\nअंटार्क्टिकात तुटला अतिविशाल हिमनग\nनोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन\nभारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था\nमल्ल्याची इंग्लंडमधील मालमत्ता जप्त करण्याचे आदेश\nरासायनिक शस्त्रास्त्र वापर बंदीसंबंधित परिषदेला भारताचा पाठिंबा\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nकॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा\nमुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी\nराज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड\nमराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार\nसमृद्धी महामार्गासाठी एकराला ५० लाख रुपये\n‘चाकण पेटवणार्‍या’ पाच हजार जणांवर गुन्हा\nकमी शब्दात व धारदार पोस्ट असावी\nआता घेता येणार वारीचे लाईव्ह दर्शन\nकर्जमाफी कायमस्वरूपी तोडगा नाही : उपराष्ट्रपती\nऔरंगाबादेत पाणीयुद्ध; नळ कापण्यावरून दोन गटात भीषण…\nआता अयोध्येत मंदिर बांधण्यासाठी जाणार\nवंचितांना यमगरवाडी प्रकल्पाने मुख्य प्रवाहात आणले: भैय्याजी…\nनांदेड महानगरपालिकामध्ये कॉंग्रेसची सत्ता\nमुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी\nतुम्ही फक्त चित्रपट दाखवण्याचे काम करा\nसत्ता मिळाली नाही तरी चालेल, पण भाजपा…\nभाजपाने काँग्रेस, राकाँ फोडली असती, म्हणूनच सत्तेत…\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे…\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nगामा पैलवानसह सहा आरोपी अटकेत\nआजपासून फिफा विश्‍वचषकाची जादू\n फुलराणीने दिले २६ वे सुवर्णपदक\nभारताची सुवर्णझळाळी; एकाच दिवशी १७ पदकांची लूट\nतेजस्विनी, अनिश, बजरंगला सुवर्ण\nकुस्तीपटूंना दोन सुवर्णांसह चार पदके\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nशेअर बाजार नव्या शिखरावर\nशेअर बाजाराचा बैल उधळला\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nध्रुपद गायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे निधन\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nतेरा वैभव अमर रहे माँ\nतेरा वैभव अमर रहे माँ\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\n७३ टक्के नागरिकांचा पंतप्रधान मोदींवर विश्‍वास\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\n‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित\nचिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार\nप्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\nअटल, अढळ आणि अमर…\nअटलजी आजचे श्यामाप्रसाद आहेत\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nअटल, अढळ आणि अमर…\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\nअटलजी आजचे श्यामाप्रसाद आहेत\nमेरा परिचय : अटलजींच्या काव्यप्रतिभेतून प्रकटलेले हिंदुसूक्त\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन…\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nराष्ट्रीय एकता दिनानिमित्त ‘एकतेसाठी दौड’\nपरराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज भूतानमध्ये\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची श्री मंजुनाथस्वामी मंदिरात…\nदशम: सौंदर्यलहरी पारायणोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरूत\nनरेंद्र मोदी यांचे नवे मंत्रिमंडळ\nनव्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन्\nश्री गजानन महाराजांची पालखी पंढरपूर वारीहून परतली\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम…\nविधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान\nAll ई-आसमंत ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१२ ऑगस्ट १८ आसमंत\n०५ ऑगस्ट १८ आसमंत\n२९ जुलै १८ आसमंत\n२२ जुलै १८ आसमंत\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१५ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१४ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n०९ मे १८ सदाफुली\n२७ डिसेंबर १७ सदाफुली\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१५ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१४ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळात एकाच दिवशी शंभर बळी\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…\nवृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…\nजनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nवृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…\nस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\n►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…\n►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…\nकॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा\n►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…\nमुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी\n►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…\nराज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड\n►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…\nतेरा वैभव अमर रहे माँ\n॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…\n॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…\n॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…\n‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित\nअभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…\nचिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार\nऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…\nसंजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…\nसूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49\nHome » नागरी, राष्ट्रीय » १० चे नाणे स्वीकारण्यास नकार, २०० रु.चा दंड\n१० चे नाणे स्वीकारण्यास नकार, २०० रु.चा दंड\nभोपाळ, १ ऑगस्ट –\n१० रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार देणार्‍या एका दुकानदाराला स्थानिक न्यायालयाने दोषी ठरवत न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत उभे राहण्याची शिक्षा आणि २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.\nमध्यप्रदेशच्या मुरैना जिल्ह्यातील ही घटना आहे. याबाबत माहिती देताना सहाय्यक लोकअभियोजक अधिकारी भूपेंद्र सिंह म्हणाले की, आकाश असे नाव असलेल्या ग्राहकाने अरुण जैन नावाच्या दुकानदाराकडून दोन रुमाल खरेदी केले होते. त्या बदल्यात त्याने दुकानदाराला दहा रुपयांची दोन नाणी दिली होती. मात्र ही नाणी आता चलनात नाही, असे सांगून दुकानदाराने ही नाणी स्वीकारण्यास नकार दिला होता.\nवाद वाढल्यावर आकाशने ही नाणी अजूनही चलनात आहे, तसेच दहा रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही, असा मुरैनाच्या जिल्हाधिकार्‍यांचा आदेश असल्याचे वारंवार सांगितले. मात्र दुकानदाराने नाणी स्वीकारली नाही व रुमाल परत घेतले.\nया ग्राहकाने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दुकानदाराविरोधात जिल्हाधिकार्‍यांचा आदेश मोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला व त्याला अटक करून न्यायालयात खटला दाखल केला. न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दुकानदाराला दोषी ठरवत त्याला न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत शिक्षा आणि २०० रुपयांचा दंड ठोठावला.\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nअंतिम अहवालानंतरच मतदार यादीचा फेरआढावा\nFiled under : नागरी, राष्ट्रीय.\nआजपासून फिफा विश्‍वचषकाची जादू\n फुलराणीने दिले २६ वे सुवर्णपदक\nभारताची सुवर्णझळाळी; एकाच दिवशी १७ पदकांची लूट\nतेजस्विनी, अनिश, बजरंगला सुवर्ण\nकुस्तीपटूंना दोन सुवर्णांसह चार पदके\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळात एकाच दिवशी शंभर बळी\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nSAMB on मग न्यायाधीशांसाठी तरी का उभे राहायचे\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nमग न्यायाधीशांसाठी तरी का उभे राहायचे\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\n७/१२ प्रभागाचा : सोलापूर महानगरपालिका निवडणूक २०१७\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (150) आंतरराष्ट्रीय (467) अमेरिका (166) आफ्रिका (7) आशिया (259) ऑस्ट्रेलिया (2) युरोप (32) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (1) ई-पेपर (159) ई-आसमंत (59) ई-मराठवाडा (48) ई-सदाफुली (4) ई-सोलापूर (48) कलाभारत (4) किशोर भारत (2) क्रीडा (20) छायादालन (36) ठळक बातम्या (8) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (886) आसमंत (841) मानसी (10) युवा भरारी (9) विविधा (4) सदाफुली (22) फिचर (16) महाराष्ट्र (435) उ.महाराष्ट्र (3) प.महाराष्ट्र (15) मराठवाडा (5) मुंबई-कोकण (87) विदर्भ (11) सोलापूर (17) रा. स्व. संघ (48) राज्य (738) आंध्र (12) ईशान्य भारत (42) उत्तर प्रदेश (100) ओडिशा (3) कर्नाटक (80) केरळ (31) गुजरात (98) गोवा (11) जम्मू-काश्मीर (94) तामिळनाडू (35) दिल्ली (52) पंजाब-हरयाणा (28) बंगाल (31) बिहार-झारखंड (66) मध्य प्रदेश-छत्तीसगड (21) राजस्थान (21) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,864) अर्थ (76) कृषी (25) नागरी (822) न्यायालय-गुन्हे (262) परराष्ट्र (83) राजकीय (261) वाणिज्य (13) विज्ञान-तंत्रज्ञान (35) संरक्षण (143) संसद (126) सांस्कृतिक (18) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (5) संपादकीय (795) अग्रलेख (382) उपलेख (412) साहित्य (11) स्तंभलेखक (1,031) अजय देशपांडे (34) अपर्णा क्षेमकल्याणी (10) अभय गोखले (25) अविनाश कोल्हे (10) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (29) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (45) डॉ.परीक्षित स. शेवडे (30) डॉ.वाय.मोहितकुमार राव (28) डॉ.सच्चिदानंद शेवडे (28) तरुण विजय (9) दत्ता पंचवाघ (10) दीपक कलढोणे (36) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (3) ब्रि. हेमंत महाजन (55) भाऊ तोरसेकर (111) मल्हार कृष्ण गोखले (52) यमाजी मालकर (35) योगानंद काळे (1) रत्नाकर पिळणकर (27) रमेश पतंगे (11) रविंद्र दाणी (57) ल.त्र्यं. जोशी (19) वसंत काणे (18) श्याम परांडे (20) श्याम पेठकर (55) श्यामकांत जहागीरदार (57) श्रीकांत पवनीकर (10) श्रीनिवास वैद्य (48) सतीष भा. मराठे (6) सुधीर पाठक (6) सुनील कुहीकर (52) सोमनाथ देशमाने (34) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (26)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/birthday-and-jyotish/today-is-your-birthday-113080600001_1.html", "date_download": "2018-08-18T09:06:35Z", "digest": "sha1:6JDSBZGF2C5JGJV7F5MSHLHQEGYKTVRJ", "length": 10347, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आज तुमचा वाढदिवस आहे | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआज तुमचा वाढदिवस आहे (06.04.2018)\nज्या लोकांका जन्म 6 तारखेला झाला आहे त्यांचा मूलक 6 असे आहे. ह्या अंकाचे जातक आकर्षक, विनोदी, कलाप्रेमी असतात. यांच्यात भरपूर आत्मविश्वास असतो. या आत्मविश्वासामुळेच हे लोक कुठल्याही परिस्थितीचा सामाना करू शकतात. तुम्ही गंधप्रिय असता. तुम्ही तुमच्या महत्वाकांक्षांप्रती गंभीर असता. 6 मूलांक शुक्र ग्रहाद्वारे संचलित होतो. स्त्री जातीकडे तुमचा कल सदैव असतो. आणि जर तुम्ही स्त्री असाल तर पुरुषांप्रती तुम्ही आकर्षित होता. पण तुम्ही मनाचे साफ असता.\nशुभ दिनांक : 6, 15, 24\nईष्टदेव : सरस्वती, महालक्ष्मी\nशुभ रंग : क्रीम, पांधरा, लाल\nज्या लोकांची जन्म तारीख 6, 15, 24 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष संमिश्र राहणार आहे. कधी यश तर कधी अपयश मिळेल. गुरु जसाच वृषभ राशीत येईल तेव्हा तो निष्क्रिय होईल. या स्थितीत तुम्हाला मनाप्रमाणे यश मिळेल. दांपत्य जीवन खुशहाल असेल. आर्थिक यश मिळेल. घराचे स्वप्न ह्या वर्षात पूर्ण होईल. प्रकृती उत्तम राहील. पारिवारिक जबाबदार्‍या वाढतील. नोकरी करणार्‍या व्यक्तींना सावधगिरी बाळगावी लागेल. बेरोजगारांना बरीच मेहनत करावी लागणार आहे.\nमूलक 6च्या प्रभावातील विशेष व्यक्ती\nआज तुमचा वाढदिवस आहे (04.04.2018)\nआज तुमचा वाढदिवस आहे (03.04.2018)\nआज तुमचा वाढदिवस आहे (30.03.2018)\nआज तुमचा वाढदिवस आहे (29.03.2018)\nआज तुमचा वाढदिवस आहे (28.03.2018)\nयावर अधिक वाचा :\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nहिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण\nहिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\nअनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ ...\nपाकच पंतप्रधानपदाची इम्रान खान घेणार आज शपथ\nपीटीआय पक्षाचे प्रुख इ्रान खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून आज शनिवारी शपथ घेणार आहेत. ...\nआता कावळे करणार साफसफाई\nफ्रान्समधील प्यू ड्यू फोयू या ऐतिहासिक पार्कमध्ये सध्या कावळ्यांना कचरा उचलण्याचं ...\nअटलजी यांच्या पार्थिवावर त्यांच्या मुलीने अंत्यसंस्कार केले\nमाजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर अंतिम ...\nपुराशी सामना करण्यासाठी टेलिकॉम कंपन्याचा पुढाकार\nकेरळमध्ये आलेल्या पुराशी सामना करण्यासाठी टेलिकॉम कंपन्याही पुढे आल्या आहेत. पुढील सात ...\nदक्षिण कोरिया बीएमडब्ल्यूवर बंदी\nजगप्रसिद्ध कार कंपनी बीएमडब्ल्यूच्या कार इंजिनांना आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://punerispeaks.com/tag/ipl-winner-2018/", "date_download": "2018-08-18T08:40:17Z", "digest": "sha1:AI7P6RIIWS2PQN7BWLZFDGOSUOCGCA2X", "length": 2643, "nlines": 59, "source_domain": "punerispeaks.com", "title": "ipl winner 2018 Archives - Puneri Speaks", "raw_content": "\nIPL विजेता टीम ला मिळणार एवढे पैसे, हरणारी टीम सुद्धा होणार करोडपती\nयंदाचा IPL फायनल चेन्नई सुपर किंग आणि सनरायसर्स हैदराबाद यांच्यादरम्यान होणार असून IPL विजेता संघाला किती पारितोषिक मिळणार हे जाणून … Read More “IPL विजेता टीम ला मिळणार एवढे पैसे, हरणारी टीम सुद्धा होणार करोडपती”\nAsian Games 2018: आशियाई क्रीडा स्पर्धा वेळापत्रक, प्रक्षेपण, कबड्डी संघ वेळापत्रक\nपिंपरीत प्रियकराने ‘Shivde, I Am Sorry’ चे ३०० फलक लावले, कोण आहे शिवडे\nअटल बिहारी वाजपेयी माहिती, अटल बिहारी वाजपेयी विशेष , अटल बिहारी वाजपेयी मराठी, अटल बिहारी वाजपेयी कविता\nपुणे तिथे काय उणे: देशात राहण्यासाठी पुणे शहर अव्वल स्थानी\nआरक्षण – एक शोधनिबंध | आरक्षण माहिती | आरक्षण म्हणजे काय\nRaj Thackeray VS Ajit Pawar: पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळ्यात एकमेकांवर टीका, वॉटरकप 2018 विजेते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/hand-blender/latest-anjali+hand-blender-price-list.html", "date_download": "2018-08-18T08:08:32Z", "digest": "sha1:MT67CNBFCEOR76NCIFIABE4K2KF75KEO", "length": 18197, "nlines": 507, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या अंजली हॅन्ड ब्लेंडर 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest अंजली हॅन्ड ब्लेंडर Indiaकिंमत\nताज्या अंजली हॅन्ड ब्लेंडरIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये अंजली हॅन्ड ब्लेंडर म्हणून 18 Aug 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 14 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक अंजलीमिक्स मेटॅलिचापलूस हॅन्ड ब्लेंडर्स ब्लू 1,490 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त अंजली हॅन्ड ब्लेंडर गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश हॅन्ड ब्लेंडर संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 14 उत्पादने\nशीर्ष 10अंजली हॅन्ड ब्लेंडर\nअंजलीमिक्स तौच वूड हॅन्ड ब्लेंडर्स मल्टि कॉलवर\n- पॉवर कॉन्सुम्पशन 230 V\nअंजलीमिक्स मेटॅलिचापलूस हॅन्ड ब्लेंडर्स ब्लू\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 watts\nअंजलीमिक्स चप्१०५ चॅप्पेर्स व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 110 watt\nअंजलीमिक्स सिल्वर मॅजिक मेटॅलिक हॅन्ड ब्लेंडर 200 व\nअंजलीमिक्स सिल्वर मॅजिक प्लस मेटॅलिक हॅन्ड ब्लेंडर 200 व\nअंजलीमिक्स हॅन्ड ब्लेंडर स्मरतंय २००व\n- मोटर स्पीड 2 speed\nअंजलीमिक्स स्मरतंय २००व हॅन्ड ब्लेंडर\nअंजलीमिक्स हॅन्ड ब्लेंडर स्मरतंय प्लस २००व\nअंजलीमिक्स चप्३०६ चॅप्पेर्स व्हाईट\nअंजलीमिक्स सिल्वर मॅजिक 200 व हॅन्ड ब्लेंडर रेड\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 W\nअंजलीमिक्स चप्३०६ 200 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 W\nअंजलीमिक्स स्मरतंय 200 200 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट अँड ब्लू\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 W\nअंजलीमिक्स सिल्वर मॅजिक 200 व हॅन्ड ब्लेंडर रेड\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 W\nअंजलीमिक्स स्मरतंय प्लस 200 200 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट अँड ब्लू\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 W\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/share-market-sensex-nifti-record/", "date_download": "2018-08-18T08:00:25Z", "digest": "sha1:GO2HSCXAFVUVFGI3UE7JTFR3PMHSEZ5F", "length": 6228, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेअर बाजार विक्रमी पातळीवर; पहिल्यांदाच सेन्सेक्स ३८ हजार पार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशेअर बाजार विक्रमी पातळीवर; पहिल्यांदाच सेन्सेक्स ३८ हजार पार\nनवी दिल्ली – सलग चौथ्या दिवशी शेअर बाजाराने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आज मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने पहिल्यांदाच ३८ हजाराचा टप्पा पार केला. तर निफ्टीही ११ हजार ४५० टप्पा पार करत ऐतिहासिक स्तरावर आहे.\nआज सकाळी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने ११८ अंकांनी झेप घेत ३८,०५० विक्रमी टप्पा गाठला. तर निफ्टीनेही २५.७५ अंकांनी उभारी घेत ११,४७५ अंकावर पोहचला.\nदरम्यान, बुधवारीही नाणेनिधीने भारताच्या विकासदराच्या वेगाबाबत आशावाद जाहीर केल्याने शेअर बाजारात तेजी होती.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्तारूढ एनडीएचे पारडे जड\nNext articleतणमोरांचेही आस्तित्त्व पुसले जाण्याची भीती\nडॉलरच्या तुलनेत रुपया आणखी घसरला\nलाॅर्डस कसोटीमध्ये काहीच कामगिरी न करता ‘या’ खेळाडूने कमावले ११ लाख रूपये…\nपुणे – उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवडीचा “विक्रम’\nस्मृती मानधनाचे इंग्लंडमध्ये विक्रमी शतक\n‘अॅपल’ कंपनीचे बाजारमूल्य जगातील अनेक देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त\nशेअर बाजारातील कमाईसाठी ‘एमएसीडी’ टूल (भाग-२)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/technological-advancements-in-post-independence-period-in-india/", "date_download": "2018-08-18T08:00:26Z", "digest": "sha1:WY5QGEND3OJ4W7IBYGQD6U6KZZ6CBCOR", "length": 13559, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#स्वातंत्र्यदिन विशेष: तंत्रसमृद्ध देशा… (भाग २) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#स्वातंत्र्यदिन विशेष: तंत्रसमृद्ध देशा… (भाग २)\nस्वातंत्र्यदिन विशेष: तंत्रसमृद्ध देशा… (भाग १)\nजोसेफ तुस्कानो (ज्येष्ठ विज्ञानलेखक)\nभारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यासाठी अर्थव्यवस्था मजबूत करणे अत्यावश्‍यक असून, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीच यासाठी मोठे योगदान देऊ शकते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर वाहतुकीपासून संरक्षणापर्यंत आणि इलेक्‍ट्रॉनिकपासून उपग्रह प्रक्षेपणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारतीय शास्त्रज्ञांनी मौलिक संशोधन केले आहे. स्वातंत्र्याची 71 वर्षे पूर्ण होत असताना मागे वळून पाहिल्यास असे दिसते की शास्त्रज्ञांचे अथक परिश्रम आणि त्यांना सरकारचा भरभरून मिळालेला पाठिंबा यामुळेच विज्ञानक्षेत्रात चौफेर प्रगती झाली आहे. आज तंत्रसमृद्ध देशांच्या यादीत भारत अभिमानाने उभा आहे, तो या शास्त्रज्ञांमुळेच\nदेशातील परिवहनाच्या क्षेत्रातही नवनवीन तंत्रज्ञानाचे कायम स्वागत होत राहिले आणि ग्रामीण भागापर्यंत त्याचा लाभ पोहोचला. पूर्वी ज्या प्रवासासाठी काही महिने लागत असत, तो प्रवास आज अवघ्या काही तासांत पूर्ण होतो. संशोधन आणि विकास योग्य वेगाने झाल्यामुळेच हे शक्‍य झाले. रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक, जलवाहतूक आणि हवाई वाहतूक अशा चारही क्षेत्रांमध्ये देशात सातत्याने प्रगती होत राहिली आहे. तथापि, जगातील प्रमुख विकसित देशांच्या पंक्तीत बसण्यासाठी वाहतूक क्षेत्रात भारतात अजून बऱ्याच सुधारणा होणे आवश्‍यक आहे.\nवैज्ञानिक विश्‍वाचा आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा अनेक प्रयोग आणि संशोधने अशी आहेत, ज्यात अनेक देशांच्या संशोधकांनी एकाच वेळी सहभाग घेतला. असेही काही प्रयोग आणि संशोधने आहेत, ज्यावर प्रत्येक देशात वेगवेगळ्या स्तरांवर काम सुरू असल्याचे दिसते. अगदी संगणकाचे उदाहरण घेतले तरी हा शोध कोणत्याही एका संशोधकाने किंवा एकट्या देशाने लावलेला नाही. या संशोधनावर अनेक देशांमध्ये एकाच वेळी काम सुरू होते. आज ज्या स्वरूपात संगणक आपल्या समोर आहे, तो विविध देशांतील संशोधकांनी स्वतंत्ररीत्या केलेल्या संशोधनाचा एकत्रित परिणाम आहे.\nसंगणकाच्या क्षेत्रात भारतातही बरेच संशोधनकार्य झाले आहे. संगणक ही एक क्रांती असून, शिक्षण, कृषी, उद्योग अशा सर्वच क्षेत्रांत संगणकाने मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणले आहेत. या संशोधनामुळे प्रत्येक क्षेत्रात नवनवीन सुविधा विकसित झाल्या आहेत. क्षणार्धात माहितीची आदानप्रदान जगाच्या कोणत्याही टोकाला केली जाऊ शकते. आजही या क्षेत्रात संशोधन सुरूच असून, आर्टिफिशियल इन्टेलिजन्स, इन्टरनेट ऑफ थिंग्ज आणि रोबोटिक्‍स या विषयांमध्ये होऊ घातलेले बदल संपूर्ण जगाला बदलून टाकणारे आहेत.\nभारतातील सॉफ्टवेअर अभियंते जगभरात हुशार अभियंते म्हणून ओळखले जातात. आरोग्याच्या क्षेत्रात कॅट स्कॅनर, संरक्षणाच्या क्षेत्रात क्षेपणास्त्रे, रडार आणि अण्वस्त्रे, दूरसंचाराच्या क्षेत्रात उपग्रह, परिवहनाच्या क्षेत्रात चालकविरहित वाहने, विमाने, कृषी क्षेत्रात रासायनिक खते आणि शेती उपकरणे या सर्वच गोष्टींचा विकास जगभरात एकाच वेळी झालेला आहे. कोणत्याही एका देशाने ही क्रांती घडविलेली नाही. या सर्वच क्षेत्रांत भारतीय संशोधक सहभागी झाले. भारत आता केवळ दुसऱ्या देशांकडून तंत्रज्ञान आयात करणारा देश उरलेला नाही तर तंत्रज्ञान विकसित करण्यात मौलिक योगदानही देत आहे.\nभारतातील प्रमुख संशोधकांमध्ये होमी भाभा, जगदीशचंद्र बोस, सी. व्ही. रमण, शांतिस्वरूप भटनागर, एम. एन. साहा, प्रफुल्लचंद्र राय, हरगोविंद खुराना या नावांचा अग्रक्रमाने समावेश होतो. जगदीशचंद्र बोस यांनी साधनसामग्रीची उपलब्धता नसतानाही आपले संशोधनकार्य सुरू ठेवले होते. रेडिओ लघुलहरींचा शोध त्यांनी लावला. विद्युतचुंबकीय लहरींचा प्रयोग त्यांनी मारकोनी यांच्या आधी केला होता. तसेच रोपांमध्ये जीवनाच्या लक्षणांचा शोधही त्यांनी घेतला. सी. व्ही. रमण हे एक प्रतिभाशाली शास्त्रज्ञ होते.\n#स्वातंत्र्यदिन विशेष: तंत्रसमृद्ध देशा… (भाग ३)\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleछातीत दुखत असेल तर दुर्लक्ष नको (भाग २)\nNext articleस्वातंत्र्यदिन विशेष: तंत्रसमृद्ध देशा… (भाग १)\nसामाजिक सलोख्यासाठी युवकांचे योगदान महत्त्वाचे\nशेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यास शासन प्रयत्नशीलः ना. शिंदे\n2022 पर्यंत अंतराळात तिरंगा फडकणार – नरेंद्र मोदी\nब्रिटनकडून भारताला स्वातंत्र्यदिनी अनोखी भेट\nभारताला ‘परफेक्ट’ करण्यासाठी मानसिकताच बदलायला हवी…(प्रभात open house)\n#विविधा : राष्ट्रध्वजाचे निर्माते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/interviews", "date_download": "2018-08-18T08:17:05Z", "digest": "sha1:4JNVGUSLE4VERNP4MIEC3U2V3LN7W2GV", "length": 4200, "nlines": 51, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Exclusive Interviews with Marathi Stars | Marathi Dhamaal", "raw_content": "\nInterview: दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांची ‘द सायलेंस’ चित्रपटाविषयीशी संबंधित मुलाखत\nआपल्या भूतकाळात घडलेल्या घटनांचं ओझं संपूर्ण आयुष्यभर वाहणाऱ्या कैक चीनींचं मौन मोडणाऱ्या ‘द सायलेंस’ या चित्रपटाच्यानिमित्ताने गजेंद्र अहिरेंशी मारलेल्या खास गप्पा-\nExclusive: अभिनेता चिराग पाटीलबद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या १० गोष्टी\nसुबोध, उर्मिला आणि क्रांती यांचा ‘करार’ प्रदर्शित होणार...\nसेलिब्रिटी डायरी: मृण्मयी गोडबोले\nEXCLUSIVE: मराठी सिनेमांना ‘टी-सिरिज’चा पाठिंबा\n‘चला हवा येऊ द्या’ का घेतायेत विश्रांती...\nहि मालिका आपल्या रोजच्या जिवनातले सगळे दु:ख विसरून आपणास हसायला शिकवते. हि मालिका जरी मराठी असली तरी चार चौकटीत न राहता ह्यांनी आपल्या मराठीचा झेंडा महाराष्ट्राबाहेर सुद्धा अभिमानाने फडकवला आहे आणि आता हि मालिका भारत दौऱ्यापुढे जाऊन विदेश दौरा करायला जात आहे.\n'गच्ची' वर झाला होता गंभीर अपघात\nहि मराठी अभिनेत्री लवकरच करतेय लग्न...\nअमृताला कोणी लिहिल पत्र...\nबघा शनायाने आयुष्यात पहिल्यांदा काय घेतला विकत\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation खाजगी गुप्तहेर अस्मिता ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://m4marathi.com/v2/egg-amulet/", "date_download": "2018-08-18T09:05:59Z", "digest": "sha1:3KMPDF3LSMPXHXVTZ52INIFBETW3TA6N", "length": 3180, "nlines": 70, "source_domain": "m4marathi.com", "title": "अंड्याचे ऑम्लेट | m4marathi", "raw_content": "\n१) एक अंडे , एक मिरची\n४) कोथिंबीर , तूप\n५) चवीनुसार मीठ .\n१) अंडे फोडून चांगले फेसावे . कांदा अगदी बारीक चिरावा .\n२) त्यात चिरलेली कोथिंबीर-मिरची व मीठ घालून कांदा चुरावा म्हणजे कांदा नरम होऊन लवकर शिजतो .\n३) अंडे व कांदा एकत्र करून ढवळून घ्यावे . तव्यावर किंवा फ्राइंग पैनमध्ये २ चमचे तूप घालून , तूप तापल्यावर अंड्याचे मिश्रण ओतावे व सगळीकडे सारखे पसरावे . गैस मंद आचेवर ठेवावा .\n४) अंडे शिजले की , कालथ्याने वरची बाजू उलटावी म्हणजे दोन्ही बाजूने चांगले होईल .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://puputupu.in/tag/%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2018-08-18T08:04:17Z", "digest": "sha1:4II66CCHO3NNSO3RBATU7X2ZZ75OVOLR", "length": 6432, "nlines": 112, "source_domain": "puputupu.in", "title": "ह्या जागी करा 'सेक्स' Archives - PupuTupu.in | PupuTupu.in", "raw_content": "\nPosts Tagged ‘ह्या जागी करा ‘सेक्स’’\nह्या जागी करा ‘सेक्स’, आनंद मिळेल अगदी ‘बेस्ट’\nह्या जागी करा ‘सेक्स’, आनंद मिळेल अगदी ‘बेस्ट’\nसेक्स ही प्रत्येक व्यक्तीची गरज असते. सेक्ससाठी आपण नेहमी चिरतरूण असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र फक्त बंद खोलीत सेक्स करणं पसंत नसतं प्रत्येकाची आवड ही वेगळी असते. त्यामुळे सेक्स करण्याच्या पद्धती देखील वेगवेगळ्या आहेत. सेक्सचा विचार करता पाच ठिकाणी जास्तीत जास्त सेक्स करण्याच विचार केला जातो. अस असू शकतं की तुम्हांला त्या ठिकाणी सेक्स करण्यात अत्यानंद मिळत असावा. कोणती अशी ठिकाणं आहेत. की, जिथे सेक्स करणं पसंत केलं जातं. पाहूयात\nजर आपली पार्टनर जेवण बनवित असेल आणि, आपल्याला सेक्सची तीव्र इच्छा होत असेल आणि आपण तिला पाहून उत्तेजित होत असल्यास आपणाला असं वाटतं की किचनमध्ये सेक्स केला जावा. असं करताना तुम्हांला फक्त मजाच नाहीतर रोमांचसुद्धा निर्माण होईल. पण असं सेक्स केल्यानंतर साफसफाईकडे देखील लक्ष देण ं तितकचं महत्त्वाचं असतं\n२. ड्रॉइंग रूम :\nजर आपण आपल्या पार्टनरसोबत ड्रॉईंग रूममध्ये बसून टीव्ही पाहण्याची मजा घेत असल्यास आपणाला वाटतं की, सेक्स करावा. तर ती योग्य वेळ असते. तर तेथील सोफ्यावर आपण सेक्सची मजा घेऊ शकता. कारण की सोफ्यावर सेक्सची पोझिशन वेगळी असते. त्यामुळे तिथे सेक्स करणं ही वेगळी अनुभूती असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरला जास्त चांगल्या प्रकारे संतुष्ट देखील करू शकता.\nजर आपण आपल्या बाथरूममध्ये शॉवर घेत असल्यास आपली पार्टनर तिथे आल्यास तो क्षण अजिबात जाऊ देऊ नये. कारण की ती उत्तम जागा असते सेक्ससाठी. आणि जर आपल्याकडे बाथटब असेलतर त्याचा पुरेपार वापर करावा आणि पाण्यासोबत सेक्सचा अनुभव घ्यावा.\n४. डायनिंग रूम :\nडायनिंग रूममध्ये खुर्चीवर बसून तुम्ही पार्टनरसोबत सेक्स करू शकता. त्यामुळे एका वेगळ्या प्रकारे सेक्स करता येतो. तुमच्या पार्टनरला नाविन्य देखील मिळते. आणि त्याचा फायदा तुमच्या सेक्स लाईफ मध्ये होईल.\n, ह्या जागी करा 'सेक्स'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.blogspot.com/2011/09/", "date_download": "2018-08-18T09:13:44Z", "digest": "sha1:53OK5OE33KS234CI6C2WBSOTY3KWTRG2", "length": 9933, "nlines": 245, "source_domain": "aisiakshare.blogspot.com", "title": "ऐसी अक्षरे: September 2011", "raw_content": "\nचोहीकडे जयघोष झाला बहोत खूब अन् वाहवा मैफलीत या रंग भरण्या 'मंदार' हा आला पहा...\nहोत नाही, मिळत नाही\nमी करेन, मी मिळवेन\nनुसतं बघत बसू शकता,\nकरके घायल हमें जो चल दिये हमसे दूर,\nलब्जों में कैद कर लिये हमनें नखरे उनके\nLabels: कविता, शायरी, हिंदी\nतू बुध्दीची देवता, तुझा जयजयकार आम्ही करता,\nतू प्रसन्न होशी आशीष दिधशी, मोरया रे बाप्पा मोरया\nलेकरं तुझी ही जनता, कुठं जाती तू बुध्दी वाटता\nतुझ्या नावानं मांडती बाजार पैशांचा, मोरया रे बाप्पा मोरया\nतुझा उत्सव भक्तिभावाचा, ज्याच्या-त्याच्या आवडी-निवडीचा\nका धमक्या देऊन खंडण्या उकळती, मोरया रे बाप्पा मोरया\nआकार मोठा तुझ्या कानांचा, ऐकशी तू धावा दीन-दुबळ्यांचा\nकान फाटेस्तोवर का मग आरत्या घोकती, मोरया रे बाप्पा मोरया\nतू होतास रे स्वामी विश्वाचा, आता संसार तुझा रस्त्यावरचा\nतुझी धिंडही काढती पाण्यात बुडवती, मोरया रे बाप्पा मोरया\nआता दाखव हिसका अंकुशाचा, भरलाय घडा मानवाच्या पापांचा\nत्यांची मस्ती जिरव जे तुला-मला छळती, मोरया रे बाप्पा मोरया\nस्वप्न एकदा तरी पडायला हवे\nप्रेम एकदा तरी करायला हवे\nते मुकाम, तेच मार्ग, तीच मंझिले\nवाट एकदा तरी चुकायला हवे\nजगायचे जुनेच की मरायचे नवे\nलक्ष्य एकदा तरी ठरायला हवे\nचौकटीत वागणे त्रिकोण तोलुनी\nढोंग एकदा तरी जमायला हवे\nदिसे तसे नसे असे निभायचे कसे\nस्पष्ट एकदा तरी कळायला हवे\nदगे छुपे कितीक, कुठे दुश्मनी छुपी\nसमोर एकदा तरी लढायला हवे\nभरभरून पुण्य मोजले पदोपदी\nमाप एकदा तरी भरायला हवे\nनुसतेच ना दुनियेत तुमच्या\nआलो अम्ही, गेलो अम्ही\nभगवन्‌ तुझ्या दुनियेस काही\nमाझे जणू सर्वस्व ती\nदुनिया तुला विसरेल भगवन्‌\nना अम्हा विसरेल ती.\nलाजून हासणे अन्‌ हासून ते पहाणे\nलाजून हासणे अन्‌ हासून ते पहाणे\nमी ओळखून आहे सारे तुझे बहाणे\nडोळ्यांस पापण्यांचा का सांग भार व्हावा\nमिटताच पापण्या अन्‌ का चंद्रही दिसावा\nहे प्रश्न जीवघेणे, हरती जिथे शहाणे\nमी ओळखून आहे सारे तुझे बहाणे\nहाती धनुष्य ज्याच्या, त्याला कसे कळावे\nहृदयात बाण ज्याच्या, त्यालाच दुःख ठावे\nतिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे\nमी ओळखून आहे सारे तुझे बहाणे\nजाता समोरुनी तू, उगवे टपोर तारा\nदेशातुनी फुलांच्या आणी सुगंध वारा\nरात्रीस चांदण्यांचे सुचते सुरेल गाणे\nमी ओळखून आहे सारे तुझे बहाणे\nगीत - मंगेश पाडगावकर\nस्वर - पं. हृदयनाथ मंगेशकर\nसंगीत - श्रीनिवास खळे\nलाजून हासणे अन्‌ हासून ते पहाणे\nया ब्लॉगवरील नवे लिखाण ई-मेलद्वारे मिळवाः\nलाजून हासणे अन्‌ हासून ते पहाणे\nया ब्लॉगवरचे विचार आणि शब्द मुक्त आहेत. तुम्ही वाचा आणि इतरांनाही वाचू द्या. - मंदार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/dattajayanti-utsav-amalner-day-1/", "date_download": "2018-08-18T08:45:13Z", "digest": "sha1:LLGTMQW6BBSEAAARGH5CD2VISPBRK3W7", "length": 9986, "nlines": 99, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "अमळनेर येथील श्री दत्तजयंती उत्सव - प्रथम दिन..............", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nअमळनेर येथील श्रीदत्तजयंती उत्सव – प्रथम दिन\nअमळनेर येथील श्रीदत्तजयंती उत्सव – प्रथम दिन\nसर्व श्रद्धावानांना माहितच आहे की सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या संकल्पानुसार श्री सद्‌गुरु पुण्यक्षेत्रम्‌च्या उभारणीचे काम यावर्षीच्या श्री दत्तजयंती उत्सवापासून सुरू करण्यात येणार आहे. तसेच या श्री सद्‌गुरु पुण्यक्षेत्रम्‌च्या उभारणीचा एक भाग म्हणूनच बापूंच्या सांगण्याप्रमाणे या वर्षापासून अंमळनेर येथेही श्रीदत्तजयंती उत्सव साजरा करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले होते. हे या दत्तजयंती उत्सवाचे पहिले वर्ष असल्यामुळे या वर्षी हा उत्सव चार दिवस साजरा होणार असून आज या उत्सवाचा पहिला दिवस होता.\nदिनांक २९-११-२०१७ रोजी मुंबईहून पूजनातील श्रीदत्तपंचायतन तसबीरी {(१) श्रीदत्तात्रेय (२) श्रीपादश्रीवल्लभ (३) श्रीनृसिंहसरस्वती (४) श्री अक्कलकोट स्वामी व (५) श्रीसाईनाथ यांच्या तसबीरी} व श्रीदत्तात्रेय उदी कुंभ अमळनेर येथे नेण्यात आले. या श्रीदत्तात्रेय उदी कुंभात सद्‍गुरु बापूंनी करून घेतलेल्या दत्त उपासना / साई गायत्री यज्ञातील तसेच इतर महत्वाच्या उत्सवात झालेल्या तसेच गुरुक्षेत्रम्‌ येथील हवनातील व यज्ञातील उदी ठेवली गेली आहे. आज उत्सवस्थळी सकाळी ९:३० वाजता मुख्य स्टेजवर तसबीरींची स्थापना होऊन त्यांचे नित्य प्राथमिक पूजन झाले. हे पूजन झाल्यावर स्टेजवरील पडदा उघडण्यात आला. यानंतर श्रीदत्तात्रेय उदी कुंभाचे उत्सवस्थळी श्रद्धावानांकडून जल्लोशात स्वागत करण्यात आले. सर्व श्रद्धावानांनी ’दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या गजरात पालखीतून श्रीदत्तात्रेय उदी कुंभ स्टेजवर आणला. महाधर्मवर्मन डॉ. योगिंद्रसिंह यांनी स्टेजवर या उदी कुंभाची स्थापना केली व कुंभाला श्वेतपुष्प व श्वेतपुष्पांचा हार अर्पण केला. स्थापना झाल्यावर महाधर्मवर्मन यांनी सर्व उपस्थित श्रद्धावानांना उदीकुंभाची माहिती दिली.\nत्यानंतर पूजकांतर्फे उत्सवातील प्रथम दिवसाचे पूजन करण्यात आले. आजच्या पूजनात श्रीगणपति अर्थवशीर्षाचे २१ वेळा पठण करण्यात आले व नैवेद्य अर्पण करण्यात आला. पठणानंतर महाधर्मवर्मन यांनी उपासना करून आजच्या पूजनाची सांगता केली. पूजनानंतर प्रत्येक श्रद्धावानाला पूजनस्थानी दुर्वा वाहण्याची संधी मिळाली. श्रद्धावानांना उत्सवस्थळी संध्याकाळी एक तास मुंबई येथील अधिवेशनात झालेल्या काही निवडक अभंग व गजराची सीडी दाखवण्यात येईल. आजच्या पूजनाची काही निवडक छायाचित्र सोबत देत आहोत.\nश्रीदत्तजयंती उत्सव – प्रथम दिन\nश्रीदत्तजयंती उत्सव – प्रथम दिन\nश्रीदत्तजयंती उत्सव – प्रथम दिन\nश्रीदत्तजयंती उत्सव – प्रथम दिन\nश्रीदत्तजयंती उत्सव – प्रथम दिन\nश्रीदत्तजयंती उत्सव – प्रथम दिन\nश्रीदत्तजयंती उत्सव – प्रथम दिन\nश्रीदत्तजयंती उत्सव – प्रथम दिन\nश्रीदत्तजयंती उत्सव – प्रथम दिन\nश्रीदत्तजयंती उत्सव – प्रथम दिन\nश्रीदत्तजयंती उत्सव – प्रथम दिन\nश्रीदत्तजयंती उत्सव – प्रथम दिन\nत्रिविक्रमाची १८ वचने (मराठी)...\nत्रिविक्रम के १८ वचन (हिन्दी)...\nअंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था में बदलाव कॆ संकेत\nईरान मसले पर तनाव बढा\nत्रिविक्रमाची १८ वचने (मराठी)\nत्रिविक्रम के १८ वचन (हिन्दी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2018-08-18T08:58:58Z", "digest": "sha1:IOXLL5D2ZPMFFDKMMCRMUQBXAASDOP4C", "length": 3985, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अपना सपना मनी मनी - विकिपीडिया", "raw_content": "अपना सपना मनी मनी\nअपना सपना मनी मनी\nअपना सपना मनी मनी हा २००६ साली प्रदर्शित झालेला एक विनोदी हिंदी चित्रपट आहे.\nइंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील अपना सपना मनी मनी चे पान (इंग्लिश मजकूर)\nइ.स. २००६ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\nइ.स. २००६ मधील चित्रपट\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०१६ रोजी १८:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.workwithlic.com/ic-33-marathi-1/", "date_download": "2018-08-18T09:17:27Z", "digest": "sha1:RZUWKB3NY5QADN7QALPCN6K5TR4DR3Q7", "length": 26037, "nlines": 660, "source_domain": "www.workwithlic.com", "title": "IC38 Online Training and Support for LIC Agent Exam", "raw_content": "\nसाप्ताहिक हफ्ते कोणतया योजनामध्ये घेतले जातात \nपुनविमर्याचा ग्राहक कोण असतो\nमर्यादपेक्षा दीर्घखमिची काळजी घेण्यासाठी विमाकर्ते कोणतया गोस्टीचा वापर करतात \nअ व् ब दोन्ही\nअ व् ब दोन्ही पैकी नाही\nलघुवीमा उत्पादने, बाजारातील कोणतया क्षेत्रवार लक्ष केंद्रित करतात \nमोठे कुटुंब असलेल्या व्यक्ति\nजास्त उत्पन्न असलेल्या व्यक्ति\nविम्यामध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे कोणते \nमुलांचे शिक्षण व् लाग्राचे नियोजन\nआयआरडीए म्हणजे काय व् त्यांच्या जबाबदान्य कोणतया \nआयआरडीए ही सरकारी संस्था विमा कंपन्यांवर लक्ष ठेवण्यासाठी तयार करण्यात आली आहे.\nइन्शुरन्स रेगुलेटरी एंड डेवलपमेंट अथॉरिटी आयआरडीए ही एक स्वायत संस्था म्हणून विमा क्षेत्रवार नियंत्रण आणि त्याचा विकास करण्यासाठी अप्रैल १९९९ मध्ये अस्तित्वात आली\nआयआरडीए ही एक स्वायत संस्था विमधारकांच्या तक्रारणिवरणासाठी तयार करण्यात आली आहे\nआयआरडीए हे कशाचे लघुरूप आहे व् त्यांचे संस्थापना वर्ष कोणते \nइन्शुरन्स रेगुलेटरी एंड डेवलपमेंट अथॉरिटी आयआरडीए ही एक स्वायत संस्था म्हणून अप्रैल १९९९ मध्ये अस्तित्वात आली\nइन्शुरन्स रेगुलेटरी एंड डेवलपमेंट अथॉरिटी ही १९५६ मध्ये अस्तित्वात आली\nआयआरडीए ही एक स्वायत संस्था विमधारकांच्या तक्रारणिवरणासाठी तयार करण्यात आली आहे\nआयुष्यातील धोके संरक्षित करण्यासाठी\nआयआरडीए कधी निर्माण झाली \nवर्तमानपापात्र जाहिरात देऊन उत्पादने विकणान्य विमा कंपनीज़ काय म्हणतात \nसंजीव हा एक विमा तग्य असून एखादा उत्पादनाचा हप्ता ठरविण्याचा उत्तम अनुभव आहे, तर त्याची प्रोफिले कशी आहे \nएका ग्राहकाला जर विविध आर्थिक उत्पादनाची तुलना करायची असेल तर त्यासाठी सर्वोत्तम व्यक्ती...असते\nआयुविमा व्यवसायामध्ये जर कोणी व्यक्ती विम्याचे हफ्ते काढण्याचे काम करत असेल, तर ती या संस्थेची असण्याची सक्यता दाट आहे.\nइंस्तीतुते ऒफ़ अच्तुरिएस ऑफ इंडिया\nचार्टड इंस्तीतुते ऑफ इन्सुरन्स\nइन्सुरन्स इंस्तीतुते ऑफ रिस्क मनेझमेंत\nटर्म इंसुरांसेमध्ये जर क्रितीकॅल इल्ल्नेस रायडर दावा घेतला गेला तर सध्याच्या पोलीसीचे काय होते \nसी आय चे फायदे बाधतील\nसी आय फायदे आताच्या आश्वस्त रकमेतून वजा होतील\nसी आय फायदे चालू\nविमाधारकाला ५ वर्षात दोन अग्रिम पेमेंट मिळतात व उरलेली रकम मुदत्पूर्तीनिरंतर मिळते. तर हि कोणत्या प्रकारची पोलीसी आहे \nइंदेम्नित्यचा सिद्धांत या प्रमुख तत्वावर आधारित आहे कि पोलीसीधारकांना यापासून दूर ठेवले पाहिजे\nखोटे इन्सुरन्स दावा करणे\nविमा मिळविण्यासाठी जास्त खर्च करावा लागतो\nग्रुप आरोग्याविम्यामध्य जोखीम तपासताना कोणती माहिती सर्वात जास्त महत्वाची असते\nजजर नि. र. १००००० la दरवर्षी ५% बोनस दिला तर १५ वर्षानंतर साध्या पुनरावर्ती बोनस सिस्तीम्मध्ये किती धावी लागील \nविमा क्षेत्र है...असे विभागले आहे\nनेमणूक आणि मनी बँक विमा\nलाइफ़ आणि नॉन लाइफ़ विमा\nसरकार आणि प्रीवते इन्सुरन्स मार्केट\nआरोग्य आणि जमा इन्सुरन्स मार्केट\nबँकेला विम्याची पोलीसी देणे\nबँकेमार्फत विमा पासी विकणे\nबँक पोलीसीमार्फत खात्री देते\nएक करार अस्तित्वात येतो जेव्हा....\nएक पार्ट ऑफर तयार करते तर दुसरी पार्टी ऑफर अतिशिवाय स्वीकारते\nएक पार्टी ऑफर तयार करते तर दुसरी पार्टी जास्त अटी ठेवते\nएक पार्टी ऑफर देते तर दुसरी पार्टी काऒन्तर ऑफर देते\nएक पार्टी ऑफर देते तर दुसरी पार्टी ऑफर घेते\nविमा एजंत हा यांचा मध्यस्थ असतो\nगग्राहक आणि विमा कंपनी\nविमा कंपनी आणि आयआरडीए\nविमा आणि पुनविमा कंपनी\nखलिल्पॆकि कशामध्ये अप्रत्यक्ष विक्री होत नाही \nविमा व्याव्शाय याच्याशी संबंधित आहे...\nमनुष्याला आयुविमार्याची गरज असते कारण\nम्रीत्युची वेळ अनिश्चित असते\nमृत्यू हा पर्याय आहे\nआयुविमार्यामध्ये झोखीम कशी ठरविली जाते \nआयुविमा कम्पनी जोखमीची पातळी यावर ठरविते\nविम्याचा व्यवसाय तीन मुख्य प्रकारांत विभागता येईल\nलाइफ़, नॉन लाइफ़, मायक्रो इन्सुरन्स\nलाइफ़, नॉन लाइफ़, इत्यादी\nलाइफ़, नॉन लाइफ़, री-इन्सुरन्स\nआयुष्य, आरोग्य, मायक्रो विमा\nअमितला कुटुंबाच्या संरक्षणासाठी एका टर्म विमा प्लांची गरज आहे. त्याने कोणाकडे जावे :\nधीर्घ्संख्येचा नियम विमाकार्त्याला कोणत्या महत्वाच्या गोष्टीची माहिती देतो \nयोग्य हप्ता निश्चित करण्यामध्ये\nअयोग्य निवड काढून टाकण्यासाठी\nकोणते वाक्य बरोबर आहे \nफुफ्फुसाचा कर्करोग हा धोकादायक आहे व धूम्रपान हा धोका आहे\nफुफ्फुसाचा कर्करोग हा धोका आहे व धूम्रपान धोकादायक आहे\nदोन्ही वाक्य बरोबर आहेत\nदोन्ही वाक्य बरोबर नाहीत\nअखाधा व्यक्तीचे अनेक विमे असतील तर त्यास मृत्युपश्चात काय फायदे होतील \nनिश्चित रकम हि सर्वे योजनाची मिळून एकत्र मिळेल\nकेवळ सर्वाधिक एस.ए. असलेल्वा योजनेची निश्चित रकम मिळेल\nकोणतीही नि.र. मिळणार नाही\nखालील पॆकि कोणत्या झोख्मी विमा करण्यायोग्य आहेत \nविना - आर्थिक जोखीम\nदोन्ही वाक्ये बरोबर आहेत\nसाहिल व विजय, समान अरोग्यस्थिथि, पण विजयसाठी मेदिकॅल्स सूचित झाले. याची कारणे काय असतील \nकोतुम्बिक अरोग्यस्थिथि मध्ये फरक\nविमा काढला जाइल असा जोखमीचा प्रकार कोणता \nनिव्वळ व संभाव्य जोखीम\nविना - आर्थिक जोखीम\nजायबंदी होण्याची जोखीम हि विम्याच्या बाबतींत कोणत्या प्रकारची जोखीम महंत येईल \nविमा हि याची यंत्रणा असते\nविमा प्रशिक्षण संस्था व जोखीम व्यवस्थापन यामुळे काय साध्य होते\nश्री कुणाल हे कार रेसमध्ये सहभागी होतात. विमा पोलीसी घेताना त्यांनी हि माहिती दिली. कोणत्या प्रकारचा धोका ते इथे वर्तवित आहेत \nबहुसंख्येचा नियम खालीलपैकी कशाने काढता येतो\nजोखीम एकत्रीकरणाने विमा कंपनी अनेक व्यक्तीचे हफ्ते एकत्र करून त्यांना समान जोख्मिपासून संरक्षण देते. कोणत्या परिस्तिथी विमा कंपनी आयुविमा व आरोग्यविमा यांच्या जोखीमिचे एकत्रीकरण करेल \nपुनाविमा देणा - याच्या शर्तीनुसार\nआयुविमा घेण्यामागचे मुख्य उदिष्ठ काय आहे \nआयुविम्यावर उपलब्ध कर्ज हे शक्यतो यावर आधारित असते ....\nआरोग्य विमा रायडर व क्रिटीकल इलनेस रायडर काश्च्या अंतर्गत येतात \nदोन्ही नोन लाइफ़ विमा\nलाइफ़ आणि नोन लाइफ़ त्यानुसार\nओम्बुदस्ममेने किती दिवसांत निकाल धायचा असतो \nविमा कंपनीने समान जोखमी एकत्र करणे याला .....महन्तात\nविम्याचे कार्य ....वर चालते\nश्री महेश हे सोफ्त्वारे अभियंता आहेत. त्यांनी रु ३0,००,००० चा टर्म विमा ३० वर्षासाठी घेतला आहे. हे कशाचे उदाहरण आहे \nनैतिक धोका खालीलपैकी कोणत्या उदाहरणात दिसतो \nकेमिअल फेकतरी मध्ये काम करणारा माणूस\nप्राथमिक शाळेत शिकविणारे शिक्षक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.blogspot.com/2014/09/", "date_download": "2018-08-18T09:12:47Z", "digest": "sha1:2AEBQCH4EBXLFNPMGK6JRMNJXEH3VP5Y", "length": 24103, "nlines": 195, "source_domain": "aisiakshare.blogspot.com", "title": "ऐसी अक्षरे: September 2014", "raw_content": "\nचोहीकडे जयघोष झाला बहोत खूब अन् वाहवा मैफलीत या रंग भरण्या 'मंदार' हा आला पहा...\nबक्षिसं, पदव्या, मानमरातब, प्रसिद्धी, पैसा...\n\"बक्षिसं, पदव्या, मानमरातब, प्रसिद्धी, पैसा हे येऊन फक्त आपली पाठ थोपटतात आणि पुन्हा धावत राहायचं बळ देतात. तेही महत्त्वाचं असतं. म्हणजे, मॅरेथॉन धावताना रस्त्यात पाण्याचा ग्लास देत, पाठीवर थोपटून प्रोत्साहन देणारे असतात ना, तशी बक्षिसं वगैरे असतात. तिथे फार रेंगाळायचं नसतं. पाण्याचा एक घोट घेत, जरा फ्रेश होऊन पुढे जायचं असतं. पाणी देऊन फ्रेश करणा-या त्या थांब्याचं महत्त्व आहेच, पण त्या पाण्याच्या ग्लाससाठी धावायचं नसतं\n- नविन काळे ('मज्जानो मंडे' या पुस्तकातून)\nबक्षिसं, पदव्या, मानमरातब, प्रसिद्धी, पैसा...\n\"शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधे सुरुवातीच्या काळात सर्व जातीच्या तरुणांचा भरणा होता. नेतेमंडळी उच्चभ्रू वर्गातील असली तरी कार्यकर्त्यांमधे मराठ्यांपासून वैश्य-वाण्यापर्यंत आणि भंडार्‍यांपासून कुणब्यांपर्यंत, तसेच माळ्यांपासून अन्य अनेक जातिजमातींचा समावेश असे. प्रारंभीच्या काळात मराठी माणूस आणि त्याची आर्थिक उन्नती हा राजकीय स्वरुपापेक्षा सामाजिक स्तरावरील हाती घेतलेला कार्यक्रम हे त्यामागील मुख्य कारण होतं. जातीपातींचा विचार न करता, फक्त मराठी माणसाचा विचार करणारी संघटना, अशी प्रतिमा याच काळात निर्माण होत होती. पण शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली एकत्रित आलेल्या या तरुणांमधे सुरुवातीच्या काळात राजकीय महत्त्वाकांक्षा मात्र निर्माण झालेली नव्हती. राजकीय विचारसरणीनं प्रेरित झालेल्या कार्यकर्त्यांचं जातवार विभाजन हे त्या काळात वेगवेगळ्या पक्षांच्या छत्राखाली पूर्वीच झालं होतं. यशवंतराव चव्हाणांची घट्ट पकड असलेला काँग्रेस हा बहुजन समाजाचं म्हणजेच मराठ्यांचं राजकारण करत होता आणि काही प्रमाणात तरी ओबीसी (अर्थात, तेव्हा ओबीसी या शब्दाचा जन्म व्हायचा होता) काँग्रेसबरोबरच होते. जनसंघामधे शेटजी-भटजीचा विचार चालायचा, तर दलितांचा मुक्काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या वेगवेगळ्या छावण्यांमधे असायचा. पण त्याचवेळी महाराष्ट्रात सामान्यतः ३०-३५ टक्के असलेल्या मागासवर्गीयांना म्हणजेच प्रामुख्याने दलितांना सत्तेच्या सोयीच्या राजकारणासाठी आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न प्रमुख राजकीय पक्षही एकाचवेळी करत असत. १९७४ मधे मध्य-दक्षिण मुंबईत लोकसभेची पोटनिवडणूक झाली, तेव्हा काँग्रेसचे उमेदवार रामराव आदिक यांना शिवसेना आणि रिपब्लिकन या दोन्ही पक्षांनी पाठिंबा दिला होता; पण आश्चर्याची बाब अशी, की शिवसेना आणि दलित यांच्यातील संघर्षाची पहिली ठिणगीही याच निवडणुकीच्या वेळी पडली. त्यानंतर पुढे सेनेने सातत्याने दलितविरोध हीच भूमिका कायम ठेवली. इथं शिवसेनेनं दलितांविरोधातील हा पहिला आक्रमक आणि हिंसक पवित्रा प्रबोधनकारांच्या १९७३ मधे झालेल्या निधनानंतरच घेतला, हे नमूद करणं जरुरीचं आहे. सर्वसमावेशक विचार हा प्रबोधनकारांचा बाणा होता. त्यामुळेच ते असेपर्यंत दलितांच्या विरोधात जाण्याची शिवसेनेची हिंमत नव्हती, हाच या प्रकाराचा अर्थ आहे. पुढे १९८० च्या दशकात मराठवाड्यात आपलं बस्तान बसवताना तर शिवसेनेला या दलितविरोधी भूमिकेचा खूपच फायदा झाला. १९८४-८५ मधे हिंदुत्व-रक्षणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्याचा दावा केल्यानंतर, शिवसेनेच्या दलितविरोधी भूमिकेला अधिकच जोर चढला... मूळातच 'मराठी माणूस' असा सोयीचा विषय घेऊन मुंबई-ठाण्यापुरतं राजकारण करणार्‍या शिवसेनेने तोपावेतो कोणत्याही स्वरुपाची ठोस सामाजिक भूमिका कधीच घेतली नव्हती. त्यामुळे मराठवाड्यातसुद्धा ही दलितांच्या विरोधातील भूमिका घेणं शिवसेनेला सोयीचं गेलं.\"\n- प्रकाश अकोलकर ('महाराष्ट्राचे राजकारण : नवे संदर्भ' या पुस्तकातून)\nLabels: मराठी, राजकीय, संग्रह\nप्रदेशाचा आणि व्यक्तीचा परस्परांवर परिणाम\n\"शरद पवार हे बारामतीचे. त्या भागाच्या औद्योगिक विकासाला पवारांचा हातभार लागला, पण स्वतःची म्हणूनही गती होती. कविवर्य मोरोपंत बारामतीचे. महाराष्ट्रातील पाटपाण्याची पहिली योजना म्हणजे नीरा कालवा योजना. तिची सुरुवात १८८५ मधे झाली. म्हणजे देशात काँग्रेसची चळवळ सुरु झाली, पुण्यात फर्ग्युसन कॉलेज सुरु झाले, त्यावर्षीच बारामतीचे लोक बागायती शेती करायला लागले. सहकारी साखर कारखान्याचा लल्लूभाई सामळदास यांचा पहिला प्रयोग बारामतीतच झाला. त्याच फसलेल्या कारखान्याच्या जागी सध्याचा माळेगाव कारखाना उभा आहे. प्रवरानगरचा कारखाना उभा करण्यासाठी झालेल्या बैठकीला गोविंदराव जिजाबा पवार हजर होते. काकडे, जाचक, शेंबेकर, दाते, पवार या मंडळींनी बारामतीत बागायत आणि साखर कारखानदारी वाढविली. त्या वातावरणात शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी राजकारण सुरु केले. बारामतीच्या जिरायती भागात त्यांनी फूड फॉर वर्क योजनेअंतर्गत पंचवीस वर्षांपूर्वी शंभर पाझर तलाव करून घेतले. आता तिथे मोठमोठे उद्योग उभे राहात आहेत.\"\n- वरुणराज भिडे ('सत्याग्रही विचारधारा' जुलै १९९३च्या अंकातून)\nप्रदेशाचा आणि व्यक्तीचा परस्परांवर परिणाम\nLabels: मराठी, राजकीय, संग्रह\n\"शिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ रोजी झाली आणि त्यापुढची दोन दशकं ठाकरे यांनी केवळ मुंबई आणि ठाणे याच परिसरातील महापालिकांच्या राजकारणावर प्रामुख्यानं लक्ष केंद्रित केलं होतं. कम्युनिस्ट आमदार कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या निर्घृण हत्येनंतर तापलेल्या वातावरणाचा फायदा उठवत, शिवसेनेनं आपला पहिला आमदार १९७० मधे विधानसभेत धाडला आणि पुढे अधूनमधून विधानसभाच नव्हे तर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातही उतरुन बघितलं. १९६६ ते १९८५ या दोन दशकांत काँग्रेसशी साटंलोटं करुन शिवसेनेनं विधान परिषदेच्याही काही जागा हासील केल्या. या २० वर्षांच्या काळात शिवसेना एकीकडं डांगे - एस. एम. जोशी - अत्रे - जॉर्ज फर्नांडिस अशा नेत्यांना 'लक्ष्य' करीत होती आणि ते काँग्रेसच्या सोयीचं असंच राजकारण होतं... आज राज्यात काँग्रेसविरोधातील एक प्रमुख पक्ष म्हणून मान्यता मिळवणार्‍या या संघटनेनं पहिल्या दोन दशकांत सातत्यानं काँग्रेसलाच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या बळ पुरवलं. शिवसेनेच्या स्थापनेनंतर अवघ्या दहा वर्षांत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जारी केली, तेव्हा सर्वच राजकीय पक्षांनी त्याविरोधात आंदोलन केलं आणि बड्या राजकीय नेत्यांबरोबरच लक्षावधी कार्यकर्त्यांनी कारावासही पत्करला. पण, शिवसेनेनं मात्र आणीबाणीला पाठिंबा जाहीर केला होता एवढंच नव्हे तर आणीबाणीनंतर जनता पक्षाचा प्रयोग फसला आणि इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्यावर १९८० मधे महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी तर ठाकरे यांनी थेट काँग्रेस प्रचाराची पालखी खांद्यावर घेऊन विधान परिषदेच्या दोन जागा पदरात पाडून घेतल्या होत्या. यावर आताच्या तरुण शिवसैनिकांचा विश्वासही बसणं अवघड आहे...\"\n- प्रकाश अकोलकर ('महाराष्ट्राचे राजकारण : नवे संदर्भ' या पुस्तकातून)\nLabels: मराठी, राजकीय, संग्रह\nपुन्हा तारखा जाहीर होतात, पुन्हा कार्यकर्ते जागे होतात\nमागच्या वेळचे शत्रू कोण, मित्र कोण, विसरुन जातात...\nपुन्हा तिकीट पैशेवाल्याला, पुन्हा तिकीट पावरवाल्याला\nवाटून वाटून उरलेच तर, एखादे मिळते कार्यकर्त्याला...\nपुन्हा मतदार खूप ऐकतो, पुन्हा उमेदवार खूप बोलतो\nतापलेल्या तव्यावर पोळी मात्र, मीडिया अलगद भाजून घेतो...\nपुन्हा दोस्तांना सांगतो मी, पुन्हा मित्रांशी बोलतो मी\nमाझे तुमचे खरे मुद्दे, पुन्हा जाहीर मांडतो मी\nमाझे तुमचे खरे मुद्दे, पुन्हा जाहीर मांडतो मी...\nLabels: कविता, मराठी, राजकीय\nया ब्लॉगवरील नवे लिखाण ई-मेलद्वारे मिळवाः\nबक्षिसं, पदव्या, मानमरातब, प्रसिद्धी, पैसा...\nप्रदेशाचा आणि व्यक्तीचा परस्परांवर परिणाम\nया ब्लॉगवरचे विचार आणि शब्द मुक्त आहेत. तुम्ही वाचा आणि इतरांनाही वाचू द्या. - मंदार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://m4marathi.com/v2/author/mukesh/page/2/", "date_download": "2018-08-18T09:08:09Z", "digest": "sha1:55I2HDYAJRQLXQQFCYZ247ZNXQRJES4U", "length": 7516, "nlines": 99, "source_domain": "m4marathi.com", "title": "- Part 2", "raw_content": "\n‘बाई असं काय विशेष घडलं आहे मी पाहते आहे की तुमचे पती स्वर्गवासी झाल्यापासून तुम्ही फारच जोरात बचत करत आहात.’ तीच त्यांची अखेरची इच्छा होती. तलावात बुडत असताना\nसंता रिक्षावाल्याला म्हणाला, ‘सदाशिव पेठेत येतोस का’ रिक्षावाला म्हणाला, ‘पन्नास रुपये होतील.’ संता म्हणाला, ‘दहा रुपये देतो.’ रिक्षावाला म्हणाला, ‘दहा रुपयांत कोण नेईल’ रिक्षावाला म्हणाला, ‘पन्नास रुपये होतील.’ संता म्हणाला, ‘दहा रुपये देतो.’ रिक्षावाला म्हणाला, ‘दहा रुपयांत कोण नेईल’ संता म्हणाला, ‘मागे बस. मी\nचिमणराव : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात, काय झालं तात्या : अहो, आमच्या शेजारच्या जोश्यांना एक लाख रुपयांची लॉटरी लागलीय. चिमणराव : मग तुम्हाला का इतका\nरस्त्याच्या कडेला कार लावून तिचं चाक काढत होता. संताने विचारले, ‘का रे, चाक काढतोस गाडीचं बंता म्हणाला, ‘फालतू प्रश्न विचारण्यापेक्षा मला मदत कर. अजून एक चाक काढायचंय, तुला\nरेल्वेत नोकरीसाठी बंड्याची मुलाखत सुरू असते. मॅनेजर : समजा, एकाच रूळावरून दोन रेल्वे येत असतील तर तू काय करशील बंड्या: मी लाल सिग्नल दाखवेन मॅनेजर : आणि सिग्नल\nइन्फर्मेशन अँण्ड कम्युनिकेशनच्या या जमान्यात टेक्नॉलॉजीमध्ये मोठय़ा प्रमाणावर बदल घडून आला आहे. स्वस्तातले स्मार्ट फोन व इंटरनेटमुळे हल्ली खेड्यातील व्यक्तीही ब्राऊजिंग करून एकाच प्रकारातील शेकडो प्रॉडक्टस ऑनलाइन बघू\nफटाके टाळा , आयुष्य सांभाळा .\nश्रीकृष्णाने आसुरीवृत्तीच्या नरकासुराचा वध करून जनतेला अनाचार, दुष्टप्रवृत्ती, लालसा व भोगवृत्तीपासून मुक्त केले व दैवी विचार देऊन सुखी केले. आपण या कार्याची आठवण ठेवण्यासाठी दीपोत्सव साजरा करून आनंद\nमेहनती बना पण वर्कोहोलिक नको.\nमल्टीनॅशनल कंपन्या सगळीकडे पसरलेल्या आहेत. प्रत्येकावर कामाचा ताण असतो, खासगी कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा देत नाहीत. म्हणून लोक थोड्या वेळात जास्त काम करण्याचा प्रय▪करीत आहेत. तांत्रिक\nदिवाळीनिमित्त एकमेकांना भेटवस्तू देण्याची परंपरा आपल्याकडे संस्कृती म्हणून जपली जाते. भेटवस्तू छोटी का मोठी याचे मोल नसते, ती ज्याला द्यावयाची असते, त्या व्यक्तीचे, नात्याचे मोल अमूल्य असते. म्हणूनच\nतिर्थाटनासाठी लाखो भाविकांचं अनोखं श्रद्धास्थान असलेले नाशिक शहर देशासह जगभरात प्रसिद्ध आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिक हे जगाचे केंद्रबिंदू झालेले असते. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पवित्र झालेले नाशिक शहर हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/441/Gandha-Ha-Shwas-Ha-Sparsh-Ha.php", "date_download": "2018-08-18T08:37:06Z", "digest": "sha1:3AMVYNNMCBB6KBJAJR5YYQMIBZ6EWASK", "length": 10922, "nlines": 156, "source_domain": "www.gadima.com", "title": "Gandha Ha Shwas Ha Sparsh Ha -: गंध हा श्वास हा स्पर्श हा : ChitrapatGeete-Popular (Ga.Di.Madgulkar|Asha Bhosle|Sudhir Phadke) | Marathi Song", "raw_content": "\nएकवार पंखावरुनी फिरो तुझा हात,\nशेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात.\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nगंध हा श्वास हा स्पर्श हा\nचित्रपट: आराम हराम आहे Film: Aram Haram Aahe\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nगंध हा, श्वास हा,स्पर्श हा सांगतो\nतूच तो, तूच तो, तूच तो \nहे धुंद डोळे नशिले नशिले\nमला वेड यांनिच रे लाविले\nहे ओठ राजा रसिले रसिले\nस्वप्‍नात रे मीच ओलावले\nहे ओळखिचे तुझे हासणे\nमाझी मला खूण आता कळे\nया मनी जो कुणी दिलरूबा छेडितो\nतूच तो, तूच तो, तूच तो \nये राजसा हा दुरावा कशाला\nघडी मीलनाची उभी राहिली\nया झिंगलेल्या गुलाबी निशेची\nकिती काळ रे वाट मी पाहिली\nकितीही लपविले खरे रूप तू\nमी जाणिले कोण आहेस तू\nबहुरूपी जो कुणी खेळ हा खेळतो\nतूच तो, तूच तो, तूच तो \nआदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.\nहले डुले पाण्यावरी नाव\nहरी थेंब घेरे दुधाचा\nहरि तुझी कळली चतुराई\nहाती नाही बळ,दारी नाही आड\nहे कधी होईल का\nहे वदन तुझे की कमळ निळे\nहेच ते चरण अनंताचे\nहोणार तुझे लगिन होणार\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://m4marathi.com/v2/tandoori-chicken-recipe-in-marathi-3/", "date_download": "2018-08-18T09:06:07Z", "digest": "sha1:HDL756OBWY2STLYJJPVVLY4ALH4YQHFD", "length": 4184, "nlines": 85, "source_domain": "m4marathi.com", "title": "तंदूर चिकन tandoori chicken recipe in marathi | m4marathi", "raw_content": "\n१) एक लहान कोवळी चिकन\n२) एक चमचा आले-लसूण गोळी\n३) दोन चमचे वाटलेली कच्ची पपई\n४) अर्धा टेबल स्पून ऑरेंज कलर\n५) दोन चमचे दही , तंदूर भट्टी\n६) एक टेबल स्पून काश्मिरी मिरची पावडर\n७) अर्धा चमचा धने-जिरे पावडर\n८) एक चाथुर्थांश चमचा गरम मसाला\n९) एक चमचा तेल किंवा तूप\n१०) चवीला मीठ .\n१) चिकनला चार ते पाच चिरा पाडाव्या . दह्यात रंग , तिखट , धने-जिरे पावडर व मीठ टाकून ते मिश्रण चिकनला चोळून चार ते पाच तास फ्रीजमध्ये ठेवावे .\n२) नंतर सळीला चिकन अडकवून भट्टीत भाजणे . शिजल्यावर थोडेसे तूप सोडून वर गरम मसाला चोळून परत दोन मिनिटे भट्टीत धरून काढावी .\n३) तंदूर भट्टी नसल्यास चार किलो डालडाचा डबा घ्या . त्या डब्याचा वरचा व खालचा गोलाकार भाग काढून टाकल्यावर डबा पोकळ राहिल .\n४) तो डबा गैसवर ठेवावा . व त्यावरून कोंबडी लावलेली शिग ठेवावी म्हणजे चिकन सगळीकडून भाजून निघेल . परोठा व नान भाजायचा असल्यास हीच घरगुती भट्टी उपयोगी पडेल .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%88%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5/", "date_download": "2018-08-18T08:00:21Z", "digest": "sha1:BLWHXTMQHUB24SANIORG5CIEZXYRH5NJ", "length": 8117, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हाती टाळ, वृंदावन डोईवरी, विद्यार्थी झाले वारकरी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nहाती टाळ, वृंदावन डोईवरी, विद्यार्थी झाले वारकरी\nकळंब येथे भागवती एकादशीनिमित्त बालदिंडी उत्साहात\nमंचर – कळंब (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि कमलजादेवी प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 8) आषाढी भागवत एकादशीचे औचित्य साधून शाळेमध्ये दिंडी काढण्यात आली.\nइंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी सणांची माहिती व्हावी, यासाठी शाळेमध्ये असे उपक्रम राबविले जातात, असे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गंगाराम भालेराव यांनी सांगितले. या दिंडी सोहळ्यामध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, विठ्ठल-रुक्‍मिणी आणि वारकरी अशा भूमिकेमध्ये विद्यार्थी शाळेमध्ये आले होते. मुलींनी नऊवारी साड्या नेसून, डोक्‍यावर तुळशी वृंदावन घेतले होते, तर मुलांनी हातात पताका, गळ्यात तुळशीमाळा घेत या दिंडी सोहळ्यातून स्वच्छताविषयक संदेश दिले. यामध्ये कचरा कुंडीचा वापर करा, सुंदर परिसर निर्माण करा, स्वच्छता वसे तेथे आरोग्य वसे, स्वच्छ घर सुंदर परिसर, शौचालय असेल तेथे खरी प्रतिष्ठा येईल, शौच खड्ड्यांचा वापर करा… असे पर्यावरणपूर्वक संदेश देत “झाडे लावा, झाडे जगवा’ अशा घोषणा दिल्या.\nकळंब चौकात दिंडीच्या पालखीचे पूजन माधव भालेराव यांनी केले. येथे मुलींनी फुगडी खेळून आनंद व्यक्त केला. शाळकरी मुलांनी टाळ-मृदंग आणि विणा वादनात ज्ञानोबामाउली-तुकाराम, तसेच विठ्ठल-रुक्‍मिणीचा गजर केला. गावातून प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरांमध्ये पुजारी प्रशांत गुरव यांनी मुख्याध्यापक विठ्ठल गभाले यांच्या हस्ते विधिवत पूजा केली. उपस्थित सर्व मुलांना राजगिरा चिक्कीचे वाटप करण्यात आले. दिंडी सोहळा यशस्वी होण्यासाठी संतोष कानडे, गणेश लोहकरे, सुनंदा भालेराव, मीना निराळी, गीतांजली शेलार, आदिती चिखले, शितल रामकर, स्वाती भालेराव, सनाह शेख आणि मदतनीस मनीषा गोसावी, राजश्री भालेराव यांनी प्रयत्न केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये उद्या बंद\nNext articleपाकिस्तानी उच्च न्यायालयाकडून नवाज शरीफ यांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2018-08-18T09:06:53Z", "digest": "sha1:JEHR7AAT6XY6ZY6GFAME2PKQNLNIQOXH", "length": 5349, "nlines": 71, "source_domain": "m4marathi.com", "title": "दुर्गभ्रमंती- किल्ले \"विशाळगड\" | m4marathi", "raw_content": "\nस्वराज्यातील गाड्कील्ल्यांमधील अजुन एक महत्वाचा किल्ला म्हणजे विशाळगड.\nकोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड हा १३४४ फूट उंचीवर असून गडाचे आवार सुमारे ३ कि. मी. लांब व १ कि. मी. रुंद आहे. गडावर महादेवाचे देऊळ, फुलाजी व बाजीप्रभु यांच्या समाधी, राजाराम महाराजांच्या पत्नी आहिल्याबाईंचे (अंबिका) स्मारक, सरकारवाडा, पिराचा दर्गा, भोपाळ तळे इ. ऐतिहासिक वास्तू आहेत. गडावर जाण्यासाठी पाऊलवाट आहे. पावसाळ्यात गडावरून आजुबाजुचे निसर्ग सौंदर्य हे अधिकच चांगले दिसते. विशाळगड हा पन्हाळ्यापासून सुमारे ४९ कि. मी. अंतरावर आहे. पावसाळा वगळता गडाच्या पायथ्यापर्यंत एस.टी. जातात. जवळच गजापुरची पावनखिंड आहे. पर्यटकांसाठी गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘गजापूर’ या गावात मुक्कामाची सोय होऊ शकते.\nविशाळगडाचे नाव ऐकताच समोर येतो तो बाजीप्रभू देशपांडे यांचा घोडखिंडीतील पराक्रम. सिद्धी जोहरच्या वेढ्यातून निसटून छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचून तेथील तोफेचा आवाज कानी येईपर्यंत बाजीप्रभूंनी घोडखिंडीत शौर्याने शत्रुला रोखले. शेवटी त्यांच्या हौतात्म्याने घोडखिंडीची ‘पावनखिंड’ झाली.अनेक गिर्यारोहक या गडाला भेट देतात. शिवकाळातील इतिहासाची, बाजीप्रभूंच्या पराक्रमाची आठवण म्हणून आजही असंख्य तरुण, इतिहासप्रेमी, गिर्यारोहक पन्हाळा – ते – विशाळगड असा प्रवास करतात.\n‘अबकी बार मोदी सरकार’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://kanifnathmadhi.org/utsav.php", "date_download": "2018-08-18T08:53:53Z", "digest": "sha1:5DEJSKIJCPUHEFORUYZZ4OSS4NJYIZK6", "length": 3691, "nlines": 35, "source_domain": "kanifnathmadhi.org", "title": "उत्सव", "raw_content": "॥ ॐ चैतन्य कानिफनाथाय नम: ॥\nआजीवन अन्नदान सभासद नाव नोंदणी व सुवर्णकलश निधी\nतिथि प्रमाणे वार्षिक उत्सव इतर उत्सव\nकैकाड्याची काठी व गोपाळ समाजाची मानाची होळी\n(दि. १ मार्च २०१८)\nरंगपंचमी (नाथसमाधी दिन सोहळा)\n(दि. ६ मार्च २०१८)\n(दि. १३ मार्च ते १६ मार्च २०१८)\nफुलबाग यात्रा (जलाभिषेक कावड सोहळा)\n(दि. १७ मार्च २०१८)\n(दि. १८ मार्च २०१८)\nदि. ०९ व १० सप्टेंबर रोजी नाथसंमेलनाचे आयोजन. नाथसंमेलनासाठी राष्ट्रीय संत गुरुदेव भय्युजी महाराजांची प्रमुख उपस्थिती\nवृद्ध व अपंग भाविकांसाठी लिफ्ट सुविधा\nमुक्कामी भाविकांसाठी भक्तनिवास खोल्यांची वाढ\nनाथभक्तांच्या वाहन सुरक्षिततेसाठी पार्किंग सुविधा\nनाथभक्तांच्या चहा व नाष्ट्यासाठी अद्ययावत कॅन्टीन सुविधा\nनाथभक्तांच्या निवारा सुविधेसाठी यात्री निवारा मंडप\nपरिसरातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय व वाचनालय सुविधा\nदररोज सकाळी ११ ते २ व रात्री ०९ ते १० या वेळेत मोफत महाप्रसाद\nपरिसरातील शालेय विद्यार्थीनींसाठी पाथर्डी व तिसगाव येथे शिक्षणासाठी मोफत बस सुविधा\nनाथभक्तांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण मंदिर परिसर सिसिटीव्हीच्या देखरेखी मध्ये\nगरिबांच्या लग्न सोहळ्यासाठी माफक दरामध्ये बहुउद्देशिय सभामंडप\nभाविकांना माफक दरामध्ये लाडू व रेवडी प्रसादालय\nमंदिर परिसरामध्ये लॉन व गार्डन\nअनुष्ठान भक्तांसाठी भव्य असा निवारा हॉल\nहोमहवन व अभिषेक पूजा सुविधा\nअतितातडीच्या आरोग्य सुविधेसाठी रुग्णवाहिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.vsagar.org/marathi-mcu-6/", "date_download": "2018-08-18T08:44:32Z", "digest": "sha1:YEMHPRFUIFKAZSBRTJ743464FW3FVTSP", "length": 12423, "nlines": 102, "source_domain": "www.vsagar.org", "title": "मराठीतून मायक्रोकंट्रोलर शिका – ६ – Vidyasagar Academy", "raw_content": "\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – ६\nThis post is part of the series मराठीतून मायक्रोकंट्रोलर प्रोग्रामिंग शिका\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – १\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – २\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – ३\nसर्वांसाठी अतिशय सोप्या भाषेत मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिकण्यासाठी विद्यासागर सरांनी चालू केलेला हा उपक्रम. आपला अभिप्राय अवश्य कळवा.\nया भागात आपण प्रत्यक्ष प्रोग्रामिंग कसे करायचे ते समजावून घेणार आहोत. त्यासाठी आपण अगदी सोपा पहिला प्रोग्रॅम लिहिणार आहोत.\nतुम्हाला माहितीच आहे की आपल्या ८०५१ डेव्हलोपमेंट बोर्डवर ८ LEDs आहेत. या सर्व LEDs आपल्याला एकाच वेळी चालू आणि बंद, चालू आणि बंद करावयाच्या आहेत.\nसुरुवातीस काय करायचे आहे\nपहिले तुमच्या PC च्या डेस्कटॉप वर या आणि Start मेनूवर क्लिक करा.\nत्यामध्ये Keil uVision3 च्या शॉर्टकट मेनूवर क्लिक करा.\nKeil uVision3 उघडल्यावर पुढे काय करायचे ते शेवटी दिलेल्या व्हिडिओत पहा.\nसुरुवातीस आपण, प्रोग्राम कसा लिहायचा ते पाहू.\nप्रोग्रॅमच्या सुरुवातीस काही संदर्भ लिहायचे असतात, याला human comments म्हणतात. कंमेंट लिहिण्याचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात तुम्ही /* आणि */ याच्या मध्ये कॉमेंट लिहू शकता. किंवा // च्या पुढे त्याच ओळीत पुढे काही लिहू शकता. उदाहरणार्थ खाली दोन प्रकारच्या human comments दिल्या आहेत, त्या पहा:\nअशा प्रकारे आपल्या प्रोग्रॅममध्ये आपण पाहिजे तितक्या आणि पाहिजे त्या ठिकाणी human comments लिहू शकतो. लक्षात ठेवा, या comments फक्त आपल्याला व्यवस्थित संदर्भ लागावा म्हणून लिहायच्या आहेत. कम्पायलर या कंमेंट्स “वाचत” नाही, म्हणजे प्रोसेस करत नाही.\nचला तर मग, आता आपण प्रोग्रॅम लिहिण्यास सुरुवात करूया. खालील प्रोग्राममध्ये मी प्रत्येक लाईन समोर, (तुम्हाला त्या लाईनचा अर्थ कळवा म्हणून) human comment लिहिली आहे.\nलक्षात ठेवा, आपल्याला संपूर्ण प्रोग्रॅम इंग्लिशमधेच लिहावा लागेल. Keil uVision3 मध्ये मराठीत लिहिलेला प्रोग्रॅम आणि human comments सुद्धा चालत नाही. त्यामुळे खालील प्रोग्रॅम सरळ कॉपी-पेस्ट करू नका. तो पाहून आणि समजावून घ्या, वाटले तर कागदावर उतरवून घ्या आणि मग Keil uVision3 मध्ये स्वतः टाईप करा. लाल कलर मध्ये लिहिलेल्या कंमेंट्स तुमच्या प्रोग्रॅम मध्ये लिहू नका. जर लिहावयाच्या असतील तर इंग्लिशमध्ये लिहा.\n८०५१ मायक्रो कंट्रोलर साठी ब्लिंकिंग LEDs चा प्रोग्रॅम\nहा प्रोग्रॅम विद्यासागर अकॅडेमीसाठी विद्यासागर सरांनी तयार केला आहे.\nदिनांक: २५ फेब्रुवारी २०१८\n#include // या ओळीत आपण \"reg51.h\" नावाची हेडर फाईल समाविष्ट (include) केली आहे.\n#include \"delay.c\" // सर्व LEDs एक सेकंड चालू आणि एक सेकंड बंद करण्यासाठी delay.c\n// हि फाईल समाविष्ट केली आहे. हि फाईल तुम्ही इथे क्लिक करून डाउनलोड करू शकता.\n#define LEDs P1 // या ओळीत आपण कम्पायलरला सांगतोय कि ८ LEDs, PORT1 ला जोडलेल्या आहेत.\nint main() // प्रोग्रॅमचे मेन फंक्शन. \"int\" असे का लिहिले आहे सांगू शकाल का तुम्ही\n{ // मेन फंक्शनचा ब्रेस (मेहरपी कंस) ओपन केला\nwhile(1) // याला इनफाइनाईट लूप म्हणतात. यामुळे LEDs सतत चालू-बंद होत राहतील.\n{ // \"while\" चा ब्रेस ओपन केला\n} // \"while\" चा ब्रेस बंद केला\n} // मेन फंक्शनचा ब्रेस बंद केला\nझाले. इथे आपला प्रोग्रॅम संपला आहे…\nआता हा प्रोग्रॅम कंपाईल करण्यासाठी तुमच्या कंप्युटरचे “F7” हे बटन दाबा. तुमचा प्रोग्राम लो लेवल लँग्वेजमध्ये कम्पाइल होईल. कम्पाइल झाल्यावर तुम्हाला तुमच्या प्रोजेक्ट फोल्डर मध्ये filename.hex नावाची फाईल मिळेल.\nहा संपूर्ण प्रोसेस कसा करायचा याचा व्हीडिओ खाली दिला आहे, तो लक्षपूर्वक पहा.\nव्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला पहिला प्रोग्राम लिहिण्याची उत्सुकता होईलच. या व्हिडिओमध्ये लिहिलेल्या प्रोग्रामचे संपूर्ण प्रोजेक्ट फोल्डर तुम्हाला डाउनलोड करावयाचे असल्यास इथे क्लिक करा.\nआता पुढील भागात मायक्रो कंट्रोलर मध्ये आपल्या प्रोग्रामची hex फाईल burn म्हणजे स्टोअर कशी करायची ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी तुमच्याजवळ, सर्व साहित्य तयार असणे आवश्यक आहे.\nयासाठी कोणकोणते साहित्य हवे, याची माहिती, कोर्सच्या या भागात दिली आहे. विद्यासागर अकॅडेमीने विद्यार्थ्यांसाठी readymade साहित्य तयार केले आहे, ते हवे असल्यास, या लिंकवर क्लिक करा.\nतसेच पुढील भागात आपण LED ब्लिंकिंगचे आणखी काही प्रोग्राम्स सुद्धा पाहणार आहोत.\nमित्रांनो, “मराठीतून मायक्रोकंट्रोलर प्रोग्रामिंग शिका” या माझ्या प्रयत्नाचे खरोखरीच चीज होत आहे अथवा नाही, हे समजण्यासाठी, आपला अभिप्राय कळविणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला या कोर्समध्ये काही सुधारणा सुचवावयाच्या असतील, काही चुका निदर्शनास आल्या असतील, तर त्या अवश्य कळवा. माझा हा प्रयत्न केवळ एकतर्फी राहू नये (अरण्यरुदन होऊ नये) आणि आपल्याला या कोर्सचा फायदा व्हावा इतकीच माफक अपेक्षा आहे.\nम्हणून मित्रांनो, आपला अभिप्राय कळविण्यास विसरू नका.\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – ७\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-39-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-18T08:00:52Z", "digest": "sha1:FQKFPJI3EGJMDX6T7QUOTNIBZIFMRYKZ", "length": 8411, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गांधी विद्यालयातील 39 विद्यार्थी गुणवत्ता यादीत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगांधी विद्यालयातील 39 विद्यार्थी गुणवत्ता यादीत\nशिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश – प्राचार्य जाधव\nराजगुरुनगर – येथील महात्मा गांधी विद्यालयातील 39 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी विभागाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवून दैदीप्यमान यश संपादित केले आहे, अशी माहिती प्राचार्य सुनील जाधव यांनी दिली.\nइयत्ता आठवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 27 विद्यार्थी तसेच इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 12 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेले आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विभागप्रमुख शैलेंद्र गावडे यांनी व पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विभागप्रमुख तुळशीराम घोलप यांनी काम पहिले. रेश्‍मा साळे, अर्चना गोडसे, संध्या कातळे, नयना लोखंडे, सविता गुरव, प्रतिपदा ठुबे, सुरेखा होले, कविता जगदाळे, मंगल गावडे, अरुणा सांडभोर, उर्मिला मुळूक, शितल कड, मृणाल कुलकर्णी, स्वाती टाकळकर, सारिका सांडभोर, संगिता शेळके या अध्यापकांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर, सचिव गणेश जोशी, शाला समिती अध्यक्ष प्रा. पांडुरंग होले व संस्था संचालकांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.\nचौकट : यशस्वी विद्यार्थ्यांचे नाव, कंसात गुण :\nइयत्ता आठवी : रेणुका धुमाळ (270), वैष्णवी धुमाळ (264), मृगजा मलघे (256), समृद्धी ठाकूर (254), दुर्वा टाकळकर (250), युवराज ठाकूर (248), मानसी साबळे (242), मृगेंद्र मलघे (242), तनिष्क खैरे (242), सार्थक धुमाळ (236), शुभम गोपाळे (236), चिन्मय जगताप (234), आकांक्षा डूबे (232), आदित्य मोटे (228), रुचिता पंडित (228), भक्ती दरवडे (224), श्रेया भूमकर (224), कार्तिक कदम (208), सागर हिंगे (206), सिद्धेश ढवळे (206), तेजस खणकर (206), दिपाली राठोड (202), सानिका पाटील (202), स्वामिनी डावरे (202), श्‍वेता गाडे (202), तन्वी देशमुख (202), प्रसाद कान्हुरकर (196).\nइयत्ता पाचवी : हुमेरा सय्यद (250), विभावरी बारणे (250), मनिष बाणखेले (242), श्रुती नाईक (240), यश राउत (238), जुई नाईकरे (230), सिद्धेश दिसले (230), नरेंद्र गडदे (224), निधी बारणे (222), मिताली येवले (220), सार्थक घोडेकर (218), वैष्णवी पोखरकर (214)\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअनुपस्थित नगरसेवकांवर कारवाई नाही\nNext articleकैद्यांना मिळणार माफी (भाग-१)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/sandip-singh-hockey-flicker-singh-of-india/", "date_download": "2018-08-18T07:59:54Z", "digest": "sha1:E3PDSXZRJ7UG7RXLPJAWKE3773LAJYXH", "length": 13390, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फ्लिकर सिंग ऑफ इंडिया – संदीप सिंग | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nफ्लिकर सिंग ऑफ इंडिया – संदीप सिंग\nआयुष्य समोर जीवनाचा अपेक्षित प्रवास घेऊन उभे असताना असे काही घडावे की, अपेक्षित काय अन अनपेक्षित काय यातील माणसाला फरकच करता येऊ नये. संदीप सिंग हे भारतीय हॉकी क्षेत्रातील एक मोठे नांव. त्यांच्या आयुष्यातही असेच काहीतरी घडले होते. हरियाणामधील शहाबाद या छोट्याशा शहरापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज संपूर्ण देशासाठी आदर्शवत बनला आहे. संदीप सिंग ते फ्लिकर सिंग ऑफ इंडिया हा त्यांचा प्रवास अत्यंत खडतर अशा मार्गावरून मार्गक्रमण करीत अपेक्षित उंचीवर जाऊन पोहचला. यासाठी त्यांना आयुष्यातील भरपूर वेळ खर्च करावा लागला.\nआपला मोठा भाऊ हॉकी खेळतोय म्हणून त्याला चांगले कपडे, शूज, मिळतात तर मलाही ते मिळतील या विचारातून संदीप यांच्या हॉकीच्या प्रवासाची सुरूवात झाली. हॉकी आवडायची मात्र खेळण्याची इच्छा त्यांची कधी झाली नव्हती. मग कपडे मिळतील, हॉकीची स्टिक आपल्यालाही मिळेल म्हणून त्यांनी हॉकीचा श्रीगणेशा केला. अत्यंत कडक शिस्तीच्या प्रशिक्षकाकडे हॉकीचे प्रशिक्षण चालू झाले. प्रशिक्षक म्हणजे एका साध्या चुकीसाठीही चार-चार दिवस शिक्षा देणारा माणूस. आपल्या देशाच्या हॉकीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी संदीप यांनी कठोर मेहनत घेत तयारी चालू केली. धनराज पिल्ले यांना आदर्श मानत आपणही काहीतरी योगदान दिले पाहिजे, असे त्यांनी मनोमन ठरविले होते. 2003 मध्ये ते एक तरुण खेळाडू म्हणून भारतीय संघात सहभागी झाले. 2004 अथेन्स ऑलिम्पिकमध्ये ते खेळले. 2005 मध्ये ज्युनियर वर्ल्ड कप मध्ये त्यांनी सर्वाधिक गोल बनविले. कमी वेळेमध्ये ते आपली ओळख बनवू शकले.\nखूप चांगल्या प्रकारे सगळे चालू असते. मात्र, 21 ऑगस्ट 2006 रोजी घडलेल्या एका घटनेमुळे त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. संदीप सिंग शताब्दी एक्‍सप्रेसने दिल्लीला निघाले होते. ज्या सीटवर ते बसले होते, त्यांच्या पाठीमागच्या सीटवर एक आरपीएफचा सैनिक बसला होता. त्या सैनिकाकडून चुकीने गोळी चालली आणि ती गोळी थेट संदीप सिंग यांना लागली. तेथून त्यांना चंडीगड येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. तीन-चार आठवड्यानंतर त्यांना शुद्ध आली. त्यावेळी ते व्हेंटीलेटर वरती होते. वर्ल्डकप खेळण्यासाठी निघालेल्या संदीप यांच्या शरीराचा अर्धा भाग असून नसल्यासारखा झाला होता. डॉक्‍टरांनी त्यांना सांगितले कि, तुम्ही भाग्यशाली आहात म्हणून वाचलात. पण तुम्ही कधी हॉकी खेळाल असे आम्हाला वाटत नाही. तुम्ही व्हीलचेयर बसू शकलात तरी खूप झाले. अशावेळीही आपल्यातील खेळाडू जागृत ठेवून संदीप यांनी सर्वांना सांगितले कि, मला माझ्या आजूबाजूला एकही नकारात्मक व्यक्ती नको आहे. भावाला ते म्हणाले की, मला माझी हॉकी स्टिक आणून द्या. आपल्याला पाय आहेत की नाहीत याची काहीही जाणीव नसतानाही मला हॉकी खेळायची आहे, मला भारतासाठी खेळायचे आहे. हे स्वप्न त्या दवाखान्यातील बेडवर पडून संदीप सिंग पाहत होते. खूप प्रयत्नांनी काही महिन्यांनतर ते व्हीलचेयर बसू शकले.\nपुनर्वसन केंद्रात दाखल होण्यासाठी विदेशात जाताना संदीप व्हीलचेयर वरती गेले मात्र, काही महिन्यांनी ते स्वतः च्या पायावर चालत भारतात दाखल झाले. आता एकच ध्येय होते ते म्हणजे भारतीय संघात दाखल व्हायचे. तयारी पुन्हा चालू केली. खूप मेहनत घेतली, सराव सामने खेळले तरी एक प्रश्न राहायचा कि, संदीप सिंग फिट नाहीयेत.. 2008 मध्ये फेडरेशनने त्यांना संधी दिली. त्यांनी त्या संधीचे सोने केले. 145 कि.मी.प्रती तास ड्रेगफ्लिक करण्याचा संदीप यांचा जागतिक विक्रम आजही अबाधित आहे. सगळे संपले असतानाही पुन्हा Come Back करणे आणि भारतीय संघाचा कर्णधार बनणे हे सोपे नव्हते. अर्जुन पुरस्कार मिळविणारे संदीप सिंग हे एक आदर्श खेळाडू आहेत. आव्हाने स्वीकारून Never give up हा दृष्टीकोन ठेवत आयुष्य जगले पाहिजे, हेच आपल्याला त्यांच्याकडून शिकायला मिळते. संदीप यांच्या आयुष्यावरील सुरमा हा चित्रपट आताच प्रदर्शित झाला आहे. जिंदगी में मुश्‍किल कुछ भी नहीं होता… असे म्हणत ते संघर्ष करीत राहिले, म्हणूनच आज ते अपेक्षित उंचीवर पोहचू शकले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअंगणवाडी कर्मचारी केला “थाळी नाद’\nNext articleतीर्थक्षेत्र देहूतील अतिक्रमणे पुन्हा “जैसे थे’\nरथिन रावचे अमेरिकन फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण\n#व्हिडीओ: व्यर्थ न जावो हे बलिदान…\nसमाजातील विचारांचा उतरता काळ\nदेश कि ड्युटी सबसे पहले…(प्रभात शॉर्ट फिल्म कॉर्नर)\nतुम हो तो हम है… (प्रभात शॉर्ट फिल्म कॉर्नर)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/?option=com_content&view=section&layout=blog&id=438&Itemid=628&fontstyle=f-smaller", "date_download": "2018-08-18T08:15:54Z", "digest": "sha1:4CTVYP23IUT757WVZ2YSCHT7ONCZTM7J", "length": 9342, "nlines": 36, "source_domain": "saneguruji.net", "title": "गोड निबंध - २", "raw_content": "शनिवार, आँगस्ट 18, 2018\nगोड निबंध - २\n१ सूर चढूं लागला\nगंगा आरंभी लहान परन्तु पुढें एवढी विशाल होते कीं, मोठमोठीं गलबतें तिच्यांतून जा ये करितात. वामनाचें पाऊल प्रथम लहान असलें तरी पुढे त्या पावलांत त्रिभुवन सामावतें. सूर्याचे बिंब प्रथम बेचक्याएवढें दिसतें, परन्तु पुढें त्याच्या तेजाने सारे विश्व धवलते. वटवृक्षाचे बी मोहरीहून बारीक असतें, परन्तु पुढे त्याचा विस्तार वर आकाशाला, खाली पाताळाला व सभोवती दशदिशांना कवटाळतो.\nसर्व थोरांचे असेंच आहे. सर्व सुंदर वस्तूंचे असेंच आहे. लहानशी कळी, परन्तु वाढत वाढत शेवटी सर्वत्र सुगंध पसरते व त्यांना उतावीळ नसते. कलाकृति घाईने होत नाहीत. सुंदर गोष्टी घाईने होत नाहीत. आई नवमास गर्भ वाढवते व मग सुंदर बाळ जन्मास येते. विनतेने घाई केली तर पांगळा अरुण मिळाला. परन्तु तिनें धीर धरला व विष्णूला पंखावर घेऊन ऊड्डाण करणारा गरुड जन्मास आला.\nऊत्कृष्ठ गवयाच्या गाण्यांत प्रथम रंग भरत नाही. अधीर लोक कांही अर्थ नाही म्हणून ऊठून जातात. परन्तु जे धीराने बसतात, त्यांना संगीताची अमर मेजवानी प्राप्त होते. उत्कृष्ट भावनाप्रधान वक्ता आधी हलक्या आवाजांत सुरुवात करतो, परन्तु पुढें आवाज एवढा वाढतो की, लाखांना खुशाल ऐकूं जावा.\nमहात्माजी असेच कलावान आहेत. कर्मकुशलता म्हणजे योग. महात्माजींजवळ अधीरपणाला वाव नाही. ऊतावीळपणा नाही. परन्तु निश्चित ध्येय डोळयांसमोर अखंड असते. स्वत:च्या सामर्थ्याचा आत्मप्रत्यय असल्यामुळे ते सदैव आशावान असतात. सिंह, कुत्र्यांप्रमाणे येता जाता भुंकत नाही बसत. परन्तु वेळ आली म्हणजे अशी घनगर्जना करतात की, सारे चुपचाप बसतात.\nमहायुध्द सुरू झाल्यापासून महात्माजींचा सूर कसा हळु होता. पुन:पुन्हा ब्रिटिशांची ते नाडी पहात होते. शत्रूच्या ऊद्गारांत अधिकांत अधिक अर्थ पहावा. त्याच्यावर जास्तीत जास्त विश्वास प्रकट करून त्याच्याजवळ बोलणे करायला जावे. परन्तु शेवटी प्रतिपक्षाचे दुष्ट नष्ट स्वरूपच प्रकट व्हावे. महात्माजींच्या या सत्याग्रही वृत्तीमुळे सरकारचे अंतरंग अधिकच काळेकुट्ट दिसते. या पार्श्वभूमीवर नोकरशाहीचें कुटिल व हिडिस स्वरूप अधिकच स्पष्टपणे सर्व जगाच्या नजरेस भरतें. महात्माजींच्या बाजूला जास्तींत जास्त नैतिक सामर्थ्य येऊन ऊभे रहातें.\nव्हॉइसरायांना भेटून आल्यावर कांही निष्पन्न झालें नाहीं असें जरी महात्माजी म्हणत होते तरी 'अद्याप दार लागलें नाहीं. अजून वाटाघाटींची शक्यता आहे ' असे त्यांनी लिहून ठेवलें. त्या लेखांत, केव्हा लढयाची वेळ येईल याचा नेम नाहीं तरी जनतेनें तयारीनें असावें, असाहि इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर लॉर्ड झेटलंड ह्यांचे तें उपमर्दकारक भाषण झालें. त्याला महात्माजींनी स्पष्ट उत्तर दिलें, व इंग्लंडला निश्चितपणें बजावलें कीं भारताला स्वातंत्र्याची उत्कट इच्छा आहे, हें मी गंभीरपणें सांगूं इच्छितों. त्यानंतर पुन्हां त्यांनी जो परवां लेख लिहिला आहे, त्यांत ब्रिटिश सरकार हिंदुस्थानावरची पकड दूर करूं इच्छित नाहीं ही दु:खाची गोष्ट आहे, असें सांगितलें आहे. हिंदुस्थानला स्वातंत्र्य देण्याची ब्रिटिशांची इच्छा नाही, इच्छा असती तर मार्ग सापडता. हिंदी स्वातंत्र्याच्या आड ब्रिटिश लोकांनीं चार धोंडे ऊभे केले आहेत. युरोपियन लोकांचे हिंतसंबंध, लष्कर, संस्थाने व जातीय तेढ या चार दगडांच्या आड ब्रिटिश सरकार लपत आहे. त्यांना आपली पिळवणूक व लूट कायम करायची आहे.\nयुरोपियन [त्यांत ब्रिटिश आलेच] व्यापा-यांचे कोट्यवधि भांडवल येथें गुंतलेलें आहे. कोट्यवधि रुपयांचे त्यांचे कर्ज हिंदुस्थान सरकारला आहे. ही चंदी सुखासुखी ब्रिटिश व युरोपियन व्यापारी कशी सोडणार हिंदुस्थान आपलें संरक्षण कसें करणार ही दुसरी चिंता इंग्रजांना आहे. पहिल्या चिंतेंतून ही दुसरी चिंता उत्पन्न झाली आहे. हिंदुस्थानची चिंता इंग्लंडला का हिंदुस्थान आपलें संरक्षण कसें करणार ही दुसरी चिंता इंग्रजांना आहे. पहिल्या चिंतेंतून ही दुसरी चिंता उत्पन्न झाली आहे. हिंदुस्थानची चिंता इंग्लंडला का त्यांचे अपरंपार भांडवल गुंतलेलें आहे म्हणून. हा हिंदी संरक्षणाच्या प्रेमाचा पुळका नसून स्वत:ची लूट चालावी म्हणून हें सारें आहे.\nगोड निबंध - भाग २\nगोड निबंध - भाग २\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-articles-lekh/27/77/Ghana-Ghana-Mala-Nabhi-Datalya.php", "date_download": "2018-08-18T08:35:47Z", "digest": "sha1:6YDGOB3WRQNR7F4V2LH2HG5PIZT34UC5", "length": 17756, "nlines": 143, "source_domain": "www.gadima.com", "title": "Ghana Ghana Mala Nabhi Datalya | घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा | Sumitra Madgulkar | सुमित्र माडगूळकर", "raw_content": "\nदुःखीच साह्य होतो दुःखांत दुःखिताला\nगदिमांच्या गाणी-आठवणी | Gaani Aathvani\nघन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा\nसुमित्र माडगूळकर | Sumitra Madgulkar\n१२ जुलै १९६२,पुण्यात हाहाकार माजला होता,जो तो ओरडत पळत होता 'पाणी आलं ..पाणी आलं...',गोष्टच तशी होती पानशेत धरणाला मोठी भेग पडली होती,भारतीय जवानांनी अथक परिश्रम करुन वाळूची हजारो पोती रात्रभर रचली होती व रात्रीच फुटणारे धरण सकाळ पर्यंत थोपवून धरल होतं.पुणेकर झोपेत असताना रात्री पाणी आलं असत तर पुण्यात प्रचंड\nजिवितहानी झाली असती,पण शेवटी व्हायचे तेच झाले पहाटे पहाटे पानशेत धरण शेवटी फु़टलं व त्याच्या मुळे थोडया वेळाने पुढचे छोटे खडकवासला धरण पण फुटले व पुण्यात पाणीच पाणी झालं हाहाकार माजला,जो तो आपला जीव वाचवण्याच्या प्रयत्नात होता.\nपुणे मुंबई रस्त्यावर असलेला गदिमांचा 'पंचवटी' बंगला,शिवाजीनगर स्टेशन पासून अगदी जवळ,मुळा नदी पासून जेमतेम ५०० मी अंतरावर असावा,पण थोडया उंच जागी असल्यामुळे पाणी बंगल्याच्या पर्यंत आले नव्हते,बंगला पाण्याखाली गेला नव्हता,त्यामुळे आसपास नदीकाठची जवळ जवळ १५०-२०० माणसे पंचवटीच्या आश्रयाला आली होती.पण हळू हळू पाणी वाढू लागले,पंचवटीच्या पहिल्या पायरी पर्यंत येऊन पोहचले तशी गदिमांना चिंता वाटू लागली,पाणी पंचवटीत शिरले असते तर अनेकांचे प्राण धोक्यात आले असते.शेवटी गदिमांनी निर्णय घेतला की माणसांना हळू हळू जवळच असलेल्या शेतकी कॉलेज व त्याच्या आजुबाजूच्या परिसरात पोहोचवायचे,तो भाग अजून जास्त उंचावर होता.\nगदिमांच्या सांगण्यावरुन जवळच राहणारा काची नावाचा माणूस आपली होडी घेऊन पंचवटीत आला,७-८ माणसे एकावेळी असे करुन पंचवटीतून माणसे पुढे जास्त सुरक्षीत स्थळी पाठवायला सुरवात झाली,ही होडी ढकलायला होते स्व:ता गदिमा,लेखक पु.भा.भावे,व्यंकटेश माडगूळकर,हिंदी साहित्यकार-लेखक हरी नारायण व्यास, रेडिओ कलाकार नेमिनाथ उपाध्ये,गदिमांचे मित्र बाळ चितळे.\nगदिमांचे मित्र बाळ चितळे नदीच्या काठी पेठेत रहात होते,त्यांचे घर पण पाण्याखाली गेले होते,पण स्व:तच्या होणार्‍या नुकसाना पेक्षा त्यांना चिंता लागली होती ती गदिमांच्या एका हस्तलिखीताची,गदिमांनी नुकतेच 'वरदक्षिणा' चित्रपटाची पटकथा लिहुन त्यांच्याकडे दिली होती व पुराच्या तडाख्यात ती घरातच राहून गेली होती,त्या काळात झेरॉक्स वगैरे प्रकार नव्हते त्यामूळे ती एकमेव प्रत होती,व तीचे काय झाले असेल याची चिंता त्यांना लागून राहीली होती.होडीने माणसे पुढे जायला लागली,गदिमांच्या पत्नी विद्याताईंनी हळदी कुंकवाने पाण्याची-नदीची पुजा केली व प्रार्थना केली 'माते सर्वांचे रक्षण कर'.\nपुढे काही तासांनी पाणी उतरण्यास सुरवात झाली,पुण्यात झालेल्या हानीचे चित्र सगळीकडे दिसतच होते,चितांक्रांत असणारे बाळ चितळे आपल्या घरी येऊन पोहोचले,घराचे दार उघडले,घरात सर्वत्र चिखल साचला होता,सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या.भिंतीवर २-३ फुटांपर्यंत पाणी चढल्याच्या खुणा होत्या,गदिमांचे स्क्रिप्ट वाचणे शक्यच नव्हते,धडधडत्या हृदयावर स्वार होऊन चितळे आतल्या खोलीत पोहचले,पण काय आश्चर्य समोरच्या टेबलावर गदिमांचे स्क्रिप्ट जसेच्या तसे पडले होते,कोरडेच्या कोरडे,पाण्याचा एकही थेंब त्यावर पडला नव्हता.\nगंमत अशी झाली की जसेजसे पाणी वाढू लागले तसे तसे ते लाकडी टेबल पाण्यावर तरंगू लागले,पाणी जसे वाढे तसे पाण्याबरोबर ते टेबल वर तरंगत गेले व पाणी उतरताच त्याबरोबर खाली आले व गदिमांचे स्क्रिप्ट जसेच्यातसे राहीले,बाळ चितळे धावत टेबलाजवळ गेले,स्क्रिप्ट चाळू लागले व समोरच गदिमांच्या सुंदर हस्ताक्षरातील गाणे लिहिलेले होते 'घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा.....'\nयाच दरम्यान परिसरात पुरानंतर पाणीटंचाई निर्माण झाली,पंचवटीपासून जवळच एक जुनी विहीर होती,गदिमांनी उद्योजक किर्लोस्करांना फोन लावला,गदिमांच्या शब्दाचा मान ठेऊन त्यांनी या विहीरीवर चक्क एक मोठा पंप लाऊन दिला व आसपासच्या लोकांची पाणीटंचाई दूर केली...आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याचा विसर गदिमांना कधीच पडला नव्हता,आपल्या साहित्यकृतीतून जितके शक्य होईल तितके समाजाचे उतराई होण्याचे प्रयत्न ते करत होते.\nपुढे 'वरदक्षिणा' हा चित्रपट प्रदर्शीत झाला,हुंडा देणे-घेणे या अनिष्ठ प्रथेवर हल्ला करणारा हा एक सामाजिक चित्रपट होता.'घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा.....','एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात....' सारखी अप्रतिम गाणी या चित्रपटात होती.हिंदी चित्रपट गायक मन्नाडे यांनी 'घन घन माला' हे गाणे आपल्या गायकीने अमर करुन टाकले होते.\nगदिमा मोठया अभिमानाने म्हणत...\n''ज्ञानियाचा वा तुक्याचा,तोच माझा वंश आहे,\nमाझिया रक्तात थोडा,ईश्वराचा अंश आहे''\nतुकारामाचे अभंग जसे पाण्यातून वर तरंगत आले जणू तेच भाग्य गदिमांच्या 'वरदक्षिणा' या संहितेला लाभले होते\nकविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)\nमहाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.\nएका तळ्यात होती बदके पिले सुरेख...\nओटीत घातली मुलगी विहीणबाई\nघन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा\nतंबाखूची रसाळ पोथी गातो ऐकावी\nबुगडी माझी सांडली गं\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://punerispeaks.com/tag/rahul-phatangade/", "date_download": "2018-08-18T08:38:42Z", "digest": "sha1:EAZIEQI6P62GYSKE2OBJTDWHPQ57CGCN", "length": 3491, "nlines": 65, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Rahul phatangade Archives - Puneri Speaks", "raw_content": "\nराहुल फटांगडे च्या खुनाचा व्हिडिओ प्रसिद्ध, समाजकंठकांकडून निर्घृणपणे खून\nसीआयडी ने राहुल फटांगडे च्या मारेक-यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली असून माहिती देणा-यास सीआयडी बक्षीस देणार आहे. 1 जानेवारी 2018 रोजी … Read More “राहुल फटांगडे च्या खुनाचा व्हिडिओ प्रसिद्ध, समाजकंठकांकडून निर्घृणपणे खून”\nराहुल फटांगडे ला न्याय मिळवुन देण्यासाठी सोशल मीडिया एकवटला… #Justice4Rahul\nराहुल फटांगडे एक ऑटोमोबाईल गॅरेज चालवणारा साधारण तरुण, कोणाच्याही अध्यात मध्यात नसणारा शांत स्वभावाचा तरुण पुणे शहरात सनसवाडी पासून २० … Read More “राहुल फटांगडे ला न्याय मिळवुन देण्यासाठी सोशल मीडिया एकवटला… #Justice4Rahul”\nAsian Games 2018: आशियाई क्रीडा स्पर्धा वेळापत्रक, प्रक्षेपण, कबड्डी संघ वेळापत्रक\nपिंपरीत प्रियकराने ‘Shivde, I Am Sorry’ चे ३०० फलक लावले, कोण आहे शिवडे\nअटल बिहारी वाजपेयी माहिती, अटल बिहारी वाजपेयी विशेष , अटल बिहारी वाजपेयी मराठी, अटल बिहारी वाजपेयी कविता\nपुणे तिथे काय उणे: देशात राहण्यासाठी पुणे शहर अव्वल स्थानी\nआरक्षण – एक शोधनिबंध | आरक्षण माहिती | आरक्षण म्हणजे काय\nRaj Thackeray VS Ajit Pawar: पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळ्यात एकमेकांवर टीका, वॉटरकप 2018 विजेते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/beed-news-majalgaon-rally-toilet-fund-75593", "date_download": "2018-08-18T08:31:00Z", "digest": "sha1:WHE3BLDRCPLNDC5IUBGITY7NDFF23KNX", "length": 11036, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "beed news majalgaon rally for toilet fund स्वच्छतागृहाचे अनुदानासाठी माजलगावात टमरेल मोर्चा | eSakal", "raw_content": "\nस्वच्छतागृहाचे अनुदानासाठी माजलगावात टमरेल मोर्चा\nबुधवार, 4 ऑक्टोबर 2017\n- विविध संघटना, पक्ष सहभागी\n- आठवडी बाजाराच्या जागेचा प्रश्न मार्गी लावा\nमाजलगाव (बीड): नगर पालिकेने प्रभाग १ ते १२ प्रभागांत बांधलेल्या वैयक्तीक स्वच्छतगृहांचे अनुदान तत्काळ वाटप करावे तसेच आठवडी बाजाराच्या जागेचा प्रश्न मार्गी लावावा, या मागण्यांसाठी पालिकेवर विवीध संघटना व पक्षाच्या वतीने आज (बुधवार) टमरेल मोर्चा काढण्यात आला.\nया मोर्चात राष्ट्रीय भिमसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास मोर्चा, मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्ष, काकू-नाना विकास आघाडी, शेतकरी संघटना, बहुजन समाज पार्टी, भारिप बहुजन महासंघ, शिवसंग्राम, एमआयएम, लोकजन शक्ती पार्टी, मानवी हक्क अभियान, संघर्ष मजुर कामगार संघटना, यशवंत सेना आदी संघटना व पक्ष सहभागी झाले होते.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nसंधीसाधू दुटप्पीपणा आणि सोयीची हिंदुविरोधी सहिष्णूता\nग्रामीण भारताचा मूक आक्रोश (वरूण गांधी)\nमहावितरणच्या लिपिकास लाच घेताना पकडले रंगेहाथ\nहल्लेखोर बिबट्या अजूनही मोकाटच; वासराचा पाडला फडशा\nसरकार आणि संघटनेच्या वादात, चिमुकले जीव वेठीला\nआता मोजा कीटकनाशकांचे बळी\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nऔरंगाबाद : 'एमआयएम'च्या नगरसेवकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा\nऔरंगाबाद : महापालिकेत एमआयएम नगरसेकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या पाच नगरसेवकांविरोधात शुक्रवारी (ता.17) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयएम नगरसेवक...\nपिंपळवंडीला मानव-बिबट सहजीवन जनजागृती\nजुन्नर - पिंपळवंडी ता.जुन्नर येथे मानव व बिबट संघर्ष व सहजीवन याविषयी मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती करण्यात आली. जुन्नर वन विभाग तसेच...\nरावेतला स्वतंत्र पोलिस चौकीची मागणी\nवाल्हेकरवाडी - रावेत परिसराचा विकास झपाट्याने वाढत आहे, त्याचप्रमाणे गुन्हेगारीही वाढत आहे. रावेत परिसरात गुन्हा घडला अथवा काही कारणास्तव पोलिस...\nताडगाव - मोफत आरोग्य शिबिरात गरिब व आदिवासी नागरीकांनी घेतला लाभ\nपाली - सुधागड तालुक्यातील ताडगाव येथे गुड डुअर्स चैरिटीज मुंबई, टिकेडिके परिसर विकास संघर्ष समिती आणि जय भैरवनाथ युवा मित्र मंडळ ताडगांव यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0", "date_download": "2018-08-18T09:00:54Z", "digest": "sha1:BTYIOT24U6GDTXISGIMCMXD2KPTY33AX", "length": 6037, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "काश्‍मीर - विकिपीडिया", "raw_content": "\nकाश्मीर हा हिमालयाच्या खोऱ्यातील एक प्रदेश. अफगाणिस्तान, मध्य एशिया, तिबेट व भारतीय उपखंड यांच्या मध्यभागी. भारताच्या जम्मू आणि काश्मीर या राज्याचा प्रमुख भाग.\nकाश्मीर खोऱ्याचा जवळजवळ २/३ भाग भारताच्या ताब्यात 'जम्मू व काश्मीर' या राज्याचा भाग . तर १/३ भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे.पाकिस्तानच्या ताब्यातील भागाला पाकिस्तानात 'आजाद कश्मीर' तर भारतात 'पाकव्याप्त काश्मीर' म्हणतात.पृथ्वीवरील स्वर्ग असे काश्मीरचे वर्णन करतात.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ ऑगस्ट २०१८ रोजी २०:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/gossips/will-janhavi-help-her-brother-in-his-marriage", "date_download": "2018-08-18T08:19:39Z", "digest": "sha1:DMQTTJKJOCNWMI4I4GV4SE6KGTG5UJDL", "length": 4777, "nlines": 53, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Will 'Janhavi' help her brother in his marriage? | Marathi Dhamaal", "raw_content": "\nजान्हवीच्या भावाचं लग्न होणार का\nझी मराठीवरील तुफान लोकप्रिय मालिका ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेत सध्या जान्हवीचा भाऊ पिंट्याच्या लग्नाचं प्रकरण चागंलच गाजतंय. पिंट्याचं लग्न मोठ्या श्रीमंत घरात व्हावं असं जान्हवीच्या आईचं स्वप्न आहे. पण बहुधा आता ते पूर्ण होऊ शकणार नाही, असंच दिसतंय. मालिकेत पिंट्यांची प्रेयसी सुनिताची एन्ट्री झालीय. सरळ – साधी सुनिता थेट घरीच पोहचल्याने मोठी अडचण निर्माण झालीय. जान्हवीच्या आईल्या हे समजल्याने ती प्रचंड संतापलीय. बाबासुध्दा फार रागावलेत. आता अशा परिस्थीतीत जान्हवीला पिंट्याच्या प्रेमप्रकरणाची माहिती होती तरीही तिने याबाबत का सांगितलं नाही, हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झालाय. आता पिट्यांचं लग्न होणार का, हे पाहण्यासाठी पाहा ‘होणार सून मी ह्या घरची’.\nतुम्हाला हे वाचायला आवडेल \n‘चला हवा येऊ द्या’ का घेतायेत विश्रांती...\n'गच्ची' वर झाला होता गंभीर अपघात\nहि मराठी अभिनेत्री लवकरच करतेय लग्न...\nअमृताला कोणी लिहिल पत्र...\nबघा शनायाने आयुष्यात पहिल्यांदा काय घेतला विकत\nसुबोध भावे करणार प्राजक्ता माळीसोबत स्क्रिन शेअर\n‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित मराठी चित्रपटाची निर्मिती करणार\n लाफ्टर क्वीन प्राजक्ता हनमघरचे झाले शुभमंगल\nइरफान खान आणि डलक्यूअर सलमान यांच्यासोबत झळकणार मिथिला पालकर\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation छोटा राजन चित्रपटात काम करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/udta-punjab-leaked-online-9840", "date_download": "2018-08-18T08:25:50Z", "digest": "sha1:YAGJM6BNALPJ37NIKAZSZBOJTJTKI75P", "length": 11764, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "'Udta Punjab' leaked online 'उडता पंजाब'ची प्रत ऑनलाईन झाली लीक! | eSakal", "raw_content": "\n'उडता पंजाब'ची प्रत ऑनलाईन झाली लीक\nगुरुवार, 16 जून 2016\nनवी दिल्ली - सेन्सॉर बोर्डाशी झालेल्या वादामुळे प्रदर्शनापूर्वीच प्रचंड चर्चेत आलेला ‘उडता पंजाब‘ चित्रपट ऑनलाईन लीक झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान चित्रपटाच्या टीमने युद्ध पातळीवर प्रयत्न करून लीक झालेला चित्रपट हटविण्यात यश मिळविले आहे.\nनवी दिल्ली - सेन्सॉर बोर्डाशी झालेल्या वादामुळे प्रदर्शनापूर्वीच प्रचंड चर्चेत आलेला ‘उडता पंजाब‘ चित्रपट ऑनलाईन लीक झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान चित्रपटाच्या टीमने युद्ध पातळीवर प्रयत्न करून लीक झालेला चित्रपट हटविण्यात यश मिळविले आहे.\n‘उडता पंजाब‘मधील आक्षेपार्ह असलेली अनेक दृश्‍ये वगळण्याची सूचना सेन्सॉर बोर्डाने दिली होती. त्यावर नाराजी व्यक्त करत चित्रपट निर्मात्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने केवळ एक दृश्‍य वगळण्याचा निर्णय दिला. न्यायालयाच्या निर्णयामुळे येत्या 17 जूनला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच दोन दिवस आधी बुधवारी या चित्रपटाची प्रत बेकायदेशीरपणे टॉरंट वेबसाईटस्‌वर अपलोड करण्यात आली होती. काही ऑनलाईन प्लॅटफॉर्मसवर या चित्रपटातील काही दृश्‍यांची चित्रे अपलोड करण्यात आली होती. तसेच अपलोड करण्यात आलेली चित्रपटाची प्रत ही सेन्सॉरला पाठविलेली असल्याच्या प्रतिक्रिया नेटिझन्सनी व्यक्त केल्या होत्या. दरम्यान चित्रपटाच्या टीमने युद्ध पातळीवर प्रयत्न करून लीक झालेला चित्रपट हटविण्यात यश मिळविले आहे.\nमुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत पंजाबमधील एका स्वयंसेवकी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेमुळे हा चित्रपट पुन्हा एकदा न्यायालयाच्या सुनावणींमध्ये अडकण्याची शक्‍यता आहे.\nटॉरंट साईटस्‌ म्हणजे काय\nडिजिटल स्वरुपात मोठ्या प्रमाणात (किंवा आकारात) असलेल्या माहितीचे (विविध स्वरुपातील फाईल्स) इंटरनेटवरून वितरण करण्यासाठीचे माध्यम म्हणजे टॉरंट साईटस्‌. या साईटस्‌वर गाणी, चित्रपट किंवा दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम मोठ्या प्रमाणात अपलोड केले जातात. माहिती वितरणाच्या काही पद्धतींचा (उदा. वेब सर्व्हर, एफटीपी सर्व्हेर) वापर करताना, वितरण करणाऱ्या संगणक आणि नेटवर्कवर मोठ्या प्रमाणावर ताण पडतो. अशा प्रकारचा ताण कमी करण्यासाठी टॉरंट साईटस्‌चा वापर करण्यात येतो.\n‘सायबर सिक्‍युरिटी सेंटर’ची घोषणा वाऱ्यावर\nपुणे - उद्योगांना आकर्षित करून रोजगारनिर्मितीचे भलेमोठे आकडे मांडलेल्या मुख्यमंत्र्यांनी माहिती तंत्रज्ञान उद्योगासह (आयटी) बॅंकिंग क्षेत्रातील संगणक...\nनौदल अधिकाऱ्याच्या फसवणुकीप्रकरणी एकाला अटक\nमुंबई - घराचे प्रलोभन दाखवून नौदलातील अधिकाऱ्याला सुमारे १३ लाखांना फसवल्याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी मुनेद्र रामटेकेला (४७) अटक केली. तक्रारदार राजीव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-bhalchandra-kulkarni-talking-about-drama-48204", "date_download": "2018-08-18T08:26:02Z", "digest": "sha1:4YYCT46BRP6NZDEAC2NFLO4KTIV6RMUL", "length": 13860, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news bhalchandra kulkarni talking about drama नाटकांच्या प्रेक्षकांची ‘उपासमार’ होतेय - भालचंद्र कुलकर्णी | eSakal", "raw_content": "\nनाटकांच्या प्रेक्षकांची ‘उपासमार’ होतेय - भालचंद्र कुलकर्णी\nशनिवार, 27 मे 2017\nपुणे - ‘‘नाटकाचे एका माणसाचे तिकीट पाचशे रुपयांना मिळत असेल, तर प्रेक्षक सहकुटुंब नाटकाला कसे येणार पण वाढत्या खर्चानुसार तिकीटवाढ योग्यच आहे, असे नाट्यव्यवस्थापक सांगत आहेत. ही कोंडी फुटली पाहिजे.\nपुणे - ‘‘नाटकाचे एका माणसाचे तिकीट पाचशे रुपयांना मिळत असेल, तर प्रेक्षक सहकुटुंब नाटकाला कसे येणार पण वाढत्या खर्चानुसार तिकीटवाढ योग्यच आहे, असे नाट्यव्यवस्थापक सांगत आहेत. ही कोंडी फुटली पाहिजे.\nकारण यात प्रेक्षकांचे हाल होत आहेत. त्यांची ‘उपासमार’ होत आहे,’’ अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी खंत व्यक्त केली. महाराष्ट्र हा नाट्यवेडा आहे. नाटक पाहणे ही प्रेक्षकांची ‘भूक’ आहे, असेही ते म्हणाले.\nनाट्य परिषदेच्या वर्धापन दिन सोहळ्यात ‘नटवर्य केशवराव दाते स्मृती पुरस्कार’ अभिनेते डॉ. राम साठ्ये, ‘मधुकर टिल्लू एकपात्री कलाकार पुरस्कार’ डॉ. विश्‍वास मेहेंदळे, ‘भार्गवराव आचरेकर स्मृती पुरस्कार’ मधू गायकवाड, ‘माणिक वर्मा पुरस्कार’ अशोक काळे यांना कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान केला. कुलकर्णी म्हणाले, ‘‘लोककला ही सर्व कलांचे मूळ आहे; पण ही लोककला सध्या कुठे आहे लोककलावंतांची अत्यंत वाईट अवस्था आहे. त्यांना व्यासपीठ मिळत नाही. सरकारचे मानधनही वेळेवर मिळत नाही. असे अनेक प्रश्‍न भेडसावत आहेत. दुसरीकडे ज्यांचे नाव झाले आहे असे कलावंत खेड्याकडे पाठ फिरवतात. नाट्य संमेलनसुद्धा ग्रामीण भागात होत नाही. त्यामुळे तिथले ‘टायलेंट’ पुढे कसे येणार लोककलावंतांची अत्यंत वाईट अवस्था आहे. त्यांना व्यासपीठ मिळत नाही. सरकारचे मानधनही वेळेवर मिळत नाही. असे अनेक प्रश्‍न भेडसावत आहेत. दुसरीकडे ज्यांचे नाव झाले आहे असे कलावंत खेड्याकडे पाठ फिरवतात. नाट्य संमेलनसुद्धा ग्रामीण भागात होत नाही. त्यामुळे तिथले ‘टायलेंट’ पुढे कसे येणार याचाही विचार झाला पाहिजे.’’\nदरम्यान, चंद्रकांत काळे, दीपक रेगे, सिद्धेश्‍वर झाडबुके, श्रद्धा सबनीस, वीरेंद्र विसाळ, संतोष पवार, चैतन्य देशमुख, सुरेंद्र गोखले, प्रतिमा काळेले, नंदकुमार भांडवलकर, आशुतोष वाडेकर, पराग चौधरी, राजेश बारबोले, डॉ. संजीवकुमार पाटील, आशुतोष पोतदार, रवी पाटील, जयदीप मुजुमदार, सुबोध पंडे, शर्वरी जाधव यांच्यासह ‘प्रयोग, पुणे’ या संस्थेलाही पुरस्काराने गौरविण्यात आले. परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, सुरेश देशमुख, दादा पासलकर, अविनाश देशमुख, मेघराज राजेभोसले, निकिता मोघे, मकरंद टिल्लू उपस्थित होते.\nसमाजाला डॉक्‍टर, अभियंते, वकील यांची जशी आवश्‍यकता आहे, तशी चांगल्या अभिनेत्यांचीही आवश्‍यकता आहे. त्यामुळे अभिनय हा विषय शाळा-महाविद्यालयांत शिकवला गेला पाहिजे.\n- भालचंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेते\nसंग्रामपूर : वाण धरण ६५ टक्के भरले\nसंग्रामपूर : सातपुडा पर्वतामधील तीन जिल्ह्यांसाठी जलसंजीवनी ठरलेले वाण धरण 65 टक्के भरले आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या ...\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nबारामती - विद्या प्रतिष्ठानच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पुरस्कार\nबारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट...\nपंकज भूसे यांचा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव\nसरळगांव - महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी होऊन दिलेल्या उद्दिष्टा पेक्षा जास्त वृक्ष लागवड करून उत्कृष्ट कामगिरी केल्याने...\nऔरंगाबाद : 'एमआयएम'च्या नगरसेवकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा\nऔरंगाबाद : महापालिकेत एमआयएम नगरसेकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या पाच नगरसेवकांविरोधात शुक्रवारी (ता.17) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयएम नगरसेवक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/kiran-rao-wants-make-biopic-38209", "date_download": "2018-08-18T08:40:22Z", "digest": "sha1:FYKYRIZPZDEHPKVYHQALHO2H7HI37C65", "length": 12198, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kiran Rao wants to make biopic किरणला बनवायचाय बायोपिक | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 3 एप्रिल 2017\nमिस्टर परफेक्‍शनिस्ट आमीर खानची पत्नी किरण राव एक चांगली निर्माती अन्‌ लेखक आहे. \"धोबीघाट' चित्रपटातून तिनं आपलं दिग्दर्शकीय कौशल्यही दाखवून दिलं होतं. अभिनेता राहुल बोसच्या \"पूर्णा' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला ती नुकतीच हजर राहिली होती. तेव्हा तिनं गौहर जान या गायिकेवर चित्रपट बनवण्याची इच्छा असल्याचं बोलून दाखवलं. गौहर जान यांनी भारतीय संगीताच्या इतिहासात 1902 मध्ये पहिल्यांदा ग्रामोफोनवर रेकॉर्डिंग केलं होतं. भारतीय शास्त्रीय संगीतातील ठुमरी प्रकाराच्या त्या जनक मानल्या जातात. \"पूर्णा' चित्रपटाचं कौतुक करताना किरण म्हणाली, \"\" \"पूर्णा'चा बायोपिक खूपच मनोरंजक आहे.\nमिस्टर परफेक्‍शनिस्ट आमीर खानची पत्नी किरण राव एक चांगली निर्माती अन्‌ लेखक आहे. \"धोबीघाट' चित्रपटातून तिनं आपलं दिग्दर्शकीय कौशल्यही दाखवून दिलं होतं. अभिनेता राहुल बोसच्या \"पूर्णा' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला ती नुकतीच हजर राहिली होती. तेव्हा तिनं गौहर जान या गायिकेवर चित्रपट बनवण्याची इच्छा असल्याचं बोलून दाखवलं. गौहर जान यांनी भारतीय संगीताच्या इतिहासात 1902 मध्ये पहिल्यांदा ग्रामोफोनवर रेकॉर्डिंग केलं होतं. भारतीय शास्त्रीय संगीतातील ठुमरी प्रकाराच्या त्या जनक मानल्या जातात. \"पूर्णा' चित्रपटाचं कौतुक करताना किरण म्हणाली, \"\" \"पूर्णा'चा बायोपिक खूपच मनोरंजक आहे. काही बायोपिक हयात असलेल्या माणसांवर बनविले जातात. बहुतांश बायोपिक मात्र सेवानिवृत्त किंवा मृत व्यक्तींवर आधारित असतात. कर्तृत्ववान व्यक्तींवरील बायोपिक पाहणं नेहमीच रोमांचकारी असतं. म्हणूनच बायोपिकना लोकप्रियता मिळते. माझीही बायोपिक बनविण्याची इच्छा आहे. खूप वर्षांपासून मी गौहर जान यांच्यावर चित्रपट बनविण्याचा विचार करत आहे. मी त्याची पटकथाही लिहीत होते; पण काही कारणानं त्यात खंड पडला. एक मात्र नक्की की गौहर जान यांच्यावर चित्रपट आला तर तो खूपच खास असेल.''\nकोल्हापुरात एक नवी ‘डावी’ चळवळ\nकोल्हापूर - कोल्हापुरात डावी चळवळ सक्रिय आहेच; पण आणखी एक नवी डावी चळवळ कोल्हापुरात उभी रहात आहे. आणि ही चळवळ फक्त डावखुऱ्या (कोल्हापुरी भाषेत...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nज्येष्ठ विचारवंत प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर यांचे निधन\nसोलापूर - ज्येष्ठ विचारवंत, लेखक प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर (वय 82) यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी (ता....\nवाट चुकलेल्या मतीमंद तरुणाला माहेर संस्थेने दिला आधार\nरत्नागिरी - मतिमंदत्वामुळे दौंड, पुणे येथून भरकटलेल्या घनश्याम विठ्ठल चौधरी याला हातखंबा येथील माहेर संस्थेने पुन्हा घर मिळवून दिले. संस्थेचे अधीक्षक...\nनवी दिल्लीः भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुढाकारामुळेच भारताचा पाकिस्तान दौरा ऐतिहासिक ठरला. पाकिस्तानच्या हद्दीत टीम इंडियाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/what-is-the-issue-of-karunanithi-funeral-405515-2/", "date_download": "2018-08-18T07:59:06Z", "digest": "sha1:MNZOIVBGJAGCKTNGVLQWVD34KCKA64EH", "length": 8873, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जाणून घ्या : काय होता करुणानिधी यांच्या अंत्यसंस्काराचा वाद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजाणून घ्या : काय होता करुणानिधी यांच्या अंत्यसंस्काराचा वाद\nतमिळनाडू राजकारणातील खूप मोठे नाव, पाच वेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्री राहिलेले एम. करुणानिधी यांच्या अंत्यसंस्कारविधी वरून मोठा वाद होता. करुणानिधींचे समर्थक करुणानिधी यांच्या पार्थीवाला चेन्नई येथील मरिना बीच येथे बाकीच्या मोठ्या नेत्यांच्या बाजूला अंत्यसंस्कार करण्याची मागणी करत आहेत तर सध्याचे एआयआयएमके सरकारने त्यांची विनंती अमान्य केली होती. त्यामुळे त्यांचा दफनविधी मरिना बीच येथे होणार की नाही याचा निर्णय मद्रास उच्च न्यायालय करणार होते.\nतमिळनाडू सरकारने अगोदर नेत्यांचे पुतळे, स्मारके यांच्यावर चालू असलेल्या खटल्याचे करणे दिले होते तर आज सरकार अन्य कारणांसह पुढे आले.\nत्यात जागा न देण्याचे मुख्य कारण म्हणजे, जे विद्यमान मुख्यमंत्री मृत्यू पावतात त्यांनाच तिथे अंत्यसंस्कारविधीसाठी जागा दिली जाते, ही सबब पुढे केली आहे. उदाहरणासाठी त्यांनी एम.जे. रामचंद्रन, अण्णा येदुराई आणि जय ललिता यांचे दाखले दिले आहेत. हे तिघेही मुख्यमंत्रिपदावर असताना गेल्याने त्यांना मरिना बीच वर दफन करण्यात आले.\nसरकारने अन्य एक माजी मुख्यमंत्र्याचे उदहारण देत ते मुख्यमंत्री नसताना गेल्याने त्यांना मरिना बीचवर अंत्यसंस्कारविधीसाठी स्थान देण्यात न आल्याचेही सांगितले आहे. यावर करुणानिधी समर्थकांनी याला विरोध करत असा काही नियम नाही, त्यामुळे जागा देण्याची मागणी केली आहे.\nयासाठी न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा चालू होती. मोठ्या संख्येने करुणानिधी समर्थक एकत्र आले होते. काही खांदे समर्थक हा डाव तमिळनाडू सरकारनेच केला असून सरकारद्वारे कटूपणा आणि राजकीय शोषण यावृत्तींची पुनरावृत्ती होत असल्याचे बोलत होते. न्यालयालयाने त्यांच्या पार्थीवाला मरिना बीचवर अंत्यसंस्कार करण्यास परवानगी दिली आणि तामिळनाडू सरकारला जागा उपलब्ध करण्याचे आदेश दिले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतणमोरांचेही आस्तित्त्व पुसले जाण्याची भीती\nNext articleपुस्तक घोटाळा प्रकरणी प्रशासनावर हल्ला बोल\nनिम्म्या कर्नाटकवर दुष्काळाचे सावट; मात्र काही भागांत पूरस्थिती\nकाश्‍मीरमधील ग्रेनेड हल्ल्यात एकाचा मृत्यूू, तिघे जखमी\nछत्तीसगडमध्ये भिंत कोसळून तीन ठार\nसात दिवस केरळमध्ये फोन कॉल आणि मोबाईल डाटा वापर विनामुल्य\nतिबेटींचे समर्थक होते अटलजी – दलाईलामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/15-km-experimental-track-mumbai-pune-hyperloop-124131", "date_download": "2018-08-18T08:56:38Z", "digest": "sha1:XJILSKG4VTVKS4ASC4LYGS4ZYQ6KV2FC", "length": 14522, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "A 15-km experimental track for Mumbai-Pune Hyperloop मुंबई- पुणे हायपरलूपसाठी 15 किलोमीटरचा प्रायोगिक ट्रॅक | eSakal", "raw_content": "\nमुंबई- पुणे हायपरलूपसाठी 15 किलोमीटरचा प्रायोगिक ट्रॅक\nरविवार, 17 जून 2018\nअमेरिकेतील नेवाडा येथे व्हर्जिन हायपरलूप तंत्रज्ञानाची चाचणी सुरू असलेल्या ठिकाणाला फडणवीस यांनी शनिवारी भेट दिली. त्यांनी हायपरलूपचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक रॉब लॉइड यांच्याशी चर्चा केली. व्हर्जिन हायपरलूपचे संस्थापक अध्यक्ष सर रिचर्ड ब्रॅनसन यांनी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्क्‍लेव्हदरम्यान कराराची घोषणा केली होती.\nपुणे : मुंबई- पुणे मार्गासाठी हायपरलूप तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित कंपनीच्या अधिकारी यांच्यात अमेरिका भेटीत झालेल्या चर्चेनुसार, हायपरलूप लवकरच आपले अभियंते पुण्याला पाठविणार आहेत. पीएमआरडीएने पहिल्या टप्प्यात 15 किलोमीटरचा प्रायोगिक ट्रॅक निश्‍चित केला आहे. या तंत्रज्ञानासाठीची 70 टक्के सामग्री आणि उपकरण राज्यातच उपलब्ध होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्‌विट केली आहे.\nअमेरिकेतील नेवाडा येथे व्हर्जिन हायपरलूप तंत्रज्ञानाची चाचणी सुरू असलेल्या ठिकाणाला फडणवीस यांनी शनिवारी भेट दिली. त्यांनी हायपरलूपचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक रॉब लॉइड यांच्याशी चर्चा केली. व्हर्जिन हायपरलूपचे संस्थापक अध्यक्ष सर रिचर्ड ब्रॅनसन यांनी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्क्‍लेव्हदरम्यान कराराची घोषणा केली होती.\nया अनुषंगाने मुंबई- पुणे मार्गासाठीची प्रकल्प उपयोगिता पडताळण्यासाठी अभ्यास करण्यात आला. त्यात शंभर टक्के इलेक्‍ट्रिक कार्यक्षम प्रणालीमुळे कार्बनचे दीड लाख टन उत्सर्जन प्रतिवर्षी कमी होणार आहे. शिवाय, या प्रकल्पामुळे वेळेची बचत, पर्यावरणाचे रक्षण, अपघातांची संख्या कमी, वाहतूक कोंडी नाही, असे सामाजिक आणि आर्थिक फायदे होणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे. पुणे- मुंबई मार्गावरील 15 किलोमीटरचा चाचणी मार्ग उभारावा, याबाबत अहवालात नमूद करण्यात आले आहे. परंतु हा मार्ग कोणत्या भागात उभारणार, याबाबत पीएमआरडीएचे आयुक्‍त किरण गित्ते यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.\nअत्यंत वेगवान सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या हायपरलूपचा प्रकल्प अमेरिका, भारत, रशिया, दुबई या चार देशांमध्ये राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात पुण्याचा समावेश असून, व्यवहार्यता अहवाल (प्री-फिझिबिलिटी रिपोर्ट) करण्यापर्यंत पुण्याने आघाडी घेतली आहे. हायपरलूपमुळे पुणे-मुंबई प्रवास अर्ध्या तासात शक्‍य होणार आहे.\nभाषणात मोठी ताकद आहे.. : बबन साळगांवकर\nसावंतवाडी : भाषणात मोठी ताकद आहे त्याच वक्तृत्वाचा फायदा घेऊन तब्बल 23 दिवसांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे पहिल्यांदा आमदार बनले आणि त्यांनी नंतर...\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nपंकज भूसे यांचा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव\nसरळगांव - महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी होऊन दिलेल्या उद्दिष्टा पेक्षा जास्त वृक्ष लागवड करून उत्कृष्ट कामगिरी केल्याने...\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून सहाजण जखमी\nबेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने बंगळूरकडे जाणारी व्हीआरएलची आराम बस उलटून चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय...\nरावेतला स्वतंत्र पोलिस चौकीची मागणी\nवाल्हेकरवाडी - रावेत परिसराचा विकास झपाट्याने वाढत आहे, त्याचप्रमाणे गुन्हेगारीही वाढत आहे. रावेत परिसरात गुन्हा घडला अथवा काही कारणास्तव पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/loot-crime-police-132758", "date_download": "2018-08-18T08:57:05Z", "digest": "sha1:GJXZLEI3J3VIIKZGCSXU52HFSXF4FWCA", "length": 14254, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "loot crime police माजी सैनिकाच्या मुलाला लुटणारे संशयित अटकेत | eSakal", "raw_content": "\nमाजी सैनिकाच्या मुलाला लुटणारे संशयित अटकेत\nसोमवार, 23 जुलै 2018\nऔरंगाबाद - सिडको बसस्थानकातून विद्यार्थी रिक्षात बसला.. तेव्हा साईबाबांची मूर्ती रिक्षाच्या हॅंडलसमोर त्याला दिसली. रिक्षा मध्यवर्ती बसस्थानकाकडे नेण्याऐवजी चालकाने त्रयस्त ठिकाणी नेऊन विद्यार्थ्याला चाकूच्या धाकावर लुबाडले; पण पोलिसांनी साईबाबांची मूर्ती असलेली रिक्षा शोधून संशयित चालक व त्याच्या साथीदाराला शनिवारी (ता. २१) अटक केली. लुबाडणुकीची घटना गुरुवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास घडली होती.\nऔरंगाबाद - सिडको बसस्थानकातून विद्यार्थी रिक्षात बसला.. तेव्हा साईबाबांची मूर्ती रिक्षाच्या हॅंडलसमोर त्याला दिसली. रिक्षा मध्यवर्ती बसस्थानकाकडे नेण्याऐवजी चालकाने त्रयस्त ठिकाणी नेऊन विद्यार्थ्याला चाकूच्या धाकावर लुबाडले; पण पोलिसांनी साईबाबांची मूर्ती असलेली रिक्षा शोधून संशयित चालक व त्याच्या साथीदाराला शनिवारी (ता. २१) अटक केली. लुबाडणुकीची घटना गुरुवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास घडली होती.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश प्रेमदास पवार (वय २०, रा. ढाकेफळ तांडा, ता. घनसावंगी, जि. जालना) असे चालकाचे, तर साथीदाराचे दीपक अरुण गायकवाड (२४, रा. बार्शीनाका, बीड) अशी नावे आहेत. ते सध्या शहरातील हनुमाननगर येथे राहतात. विकास भगवान चाटे (रा. मेव्हणा राजा, ता. देऊळगाव राजा) विज्ञान शाखेच्या तृतीय वर्षात शिक्षण घेतो. तो माजी सैनिकाचा मुलगा असून, नाशिकच्या एका कंपनीत मुलाखतीसाठी जात होता. देऊळगाव राजा येथून तो गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास एसटी बसने निघून सिडको बसस्थानकात रात्री पावणेअकराच्या सुमारास पोचला. तेथून मध्यवर्ती बसस्थानकावर जाताना पवार याच्या रिक्षात तो बसला. त्यावेळी पवारचा साथीदार गायकवाड रिक्षातच होता.\nमध्यवर्ती बसस्थानकात जाण्याऐवजी चालकाने विकासला कैलासनगर येथील स्मशानभूमीतील मोकळ्या मैदानात नेले. तेथे पवार व गायकवाडने त्याला चाकूचा धाक दाखवून बेदम मारहाण केली. यानंतर दोघांनी त्याचा मोबाईल, तीन हजार रुपये, शैक्षणिक कागदपत्रांसह बॅग हिसकावली. यानंतर विकासने जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली. यानंतर पोलिसांनी चालकासह दोघांना अटक केली.\nही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक शरद जोगदंड, साईनाथ गीते, उपनिरीक्षक शेख रफीक, जमादार शेख हारुण, संपत राठोड, संजय गावंडे, गणेश नागरे, सुनील जाधव आणि बाळू थोरात यांनी केली.\nगुन्हा नोंद झाल्यानंतर रिक्षाचा क्रमांकही विकासने पाहिलेला नव्हता; पण आत हॅंडलसमोर साईबाबांची मूर्ती आहे. दोघेही मराठी असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ही रिक्षा हुडकून दोन्ही संशयितांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून लुटीतील साहित्य जप्त केले.\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून सहाजण जखमी\nबेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने बंगळूरकडे जाणारी व्हीआरएलची आराम बस उलटून चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय...\nउंड्री - पाचव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजूर ठार\nउंड्री - गुलाम अली नगर गल्ली नं 6 दि.13 ऑगस्ट दु.12.30 वाजता एका निर्माणाधीन इमारतीचे काम सुरू असताना पाचव्या मजल्यावर पडून राजशेखर माशाले (वय 33...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-risk-land-depletion-127168", "date_download": "2018-08-18T08:58:07Z", "digest": "sha1:AIXGNZMOCEZCULHJRGKU57SVJ32XB7OA", "length": 15345, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news The risk of land depletion वाळूउपशाने जमीन खचण्याचा धोका | eSakal", "raw_content": "\nवाळूउपशाने जमीन खचण्याचा धोका\nशनिवार, 30 जून 2018\nसातारा - जिहे (ता. सातारा) येथे पोकलेनच्या साहाय्याने बेसुमार वाळू उपसा होत असल्याने कृष्णा नदीपात्राची अक्षरश: चाळण होत आहे. २५ ते ३० फुटापेक्षा जास्त खड्ड्यांमुळे पात्र बदलून नदी काठची जमीन खचण्याची शक्‍यता आहे. आवाज उठविणाऱ्यांना दडपण्याची ठेकेदाराची भूमिका आणि प्रशासनाच्या धृतराष्ट्री भूमिकेमुळे नदीपात्र व लगतच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.\nसातारा - जिहे (ता. सातारा) येथे पोकलेनच्या साहाय्याने बेसुमार वाळू उपसा होत असल्याने कृष्णा नदीपात्राची अक्षरश: चाळण होत आहे. २५ ते ३० फुटापेक्षा जास्त खड्ड्यांमुळे पात्र बदलून नदी काठची जमीन खचण्याची शक्‍यता आहे. आवाज उठविणाऱ्यांना दडपण्याची ठेकेदाराची भूमिका आणि प्रशासनाच्या धृतराष्ट्री भूमिकेमुळे नदीपात्र व लगतच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.\nजिहे येथे कृष्णा नदीपात्रात गेल्या काही महिन्यांपासून वाळूचा बेकायदेशीर उपसा सुरू आहे. प्रशासनाने आखून दिलेल्या जागेपेक्षा अधिक ठिकाणी खुदाई सुरू आहे. वाळू उपशासंदर्भात प्रशासनाचे काही नियम आहेत. मात्र, या नियमांची खुलेआम पायमल्ली सुरू आहे. नदीपात्रातून वाळू काढण्यासाठी पोकलेन किंवा जेसीबी वापराला परवानगी नाही, तरीही जिहे येथे दोन- तीन पोकलेन आणि जेसीबीच्या साहाय्याने नदीपात्र खणण्याचे काम सुरू आहे. शासकीय नियमानुसार तीन मीटरपेक्षा जास्त खोलीवरील वाळू काढता येत नाही. मात्र, प्रत्यक्षात या ठिकाणी २५ ते ३० फूट खोल खड्डे काढून वाळूची बेसुमार लूट सुरू आहे. या प्रकारामुळे लगतच्या शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. जनावरांना पाणी पाजायला नेता येत नाही, की पूर्वापार असलेल्या रस्त्याने साधी बैलगाडीही नेता येत नाही. मोठ्या खड्ड्यांमुळे नदीपात्र बदलण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. याबाबत आवाज उठविल्याच्या कारणावरून गावात काही दिवसापूर्वी भांडणेही झाली. त्यामध्ये सरपंचांच्या पतीला मारहाण झाली. या वेळी झालेल्या भांडणामध्ये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला. त्याचा तपास पोलिस करत आहेत. त्यात वस्तुस्थितीसमोर येईलच. मात्र, या भांडणानंतर महसूल अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊनही वाळूच्या बेसुमार उपशाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे गावामध्ये बोलायचे कोणी असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nप्रशालनाच्या या धृतराष्ट्री भूमिकेमुळे वाळू उपसा करणाऱ्यांना बळ मिळत आहे. अधिकाऱ्यांची पाठ फिरल्यानंतर पुन्हा रात्रंदिवस वाळूचा उपसा जोरदारपणे सुरू झाला आहे. त्याकडे तलाठ्यापासून सर्वांचेच दुर्लक्ष आहे. त्यामुळे तहसीलदार, प्रांताधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणच्या वाळू उपशाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्‍यक आहे. अन्यथा नदीपात्राची होणारी चाळण अनेकांच्या जिवावर उठू शकते. जिहे येथील वाळू उपशाची परवानगी, प्रत्यक्षात झालेला उपसा याचा संपूर्ण तपास होणे आवश्‍यक आहे. त्यातून वाळू चोरीचा मोठा घोटाळा समोर येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.\nपोलिस अधीक्षकांनी चौकशी करावी\nदरम्यान, पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनीही वाळूमाफियांना लगाम लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे जिहे येथील वाळू उपशाच्या व त्यातून निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाची त्यांनी चौकशी करणे आवश्‍यक आहे.\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nउंड्री - पाचव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजूर ठार\nउंड्री - गुलाम अली नगर गल्ली नं 6 दि.13 ऑगस्ट दु.12.30 वाजता एका निर्माणाधीन इमारतीचे काम सुरू असताना पाचव्या मजल्यावर पडून राजशेखर माशाले (वय 33...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B2.php", "date_download": "2018-08-18T09:07:50Z", "digest": "sha1:3ZWCUVHFZHMQIOLE4HHOXUS65KIWOP7F", "length": 77358, "nlines": 1230, "source_domain": "tarunbharat.org", "title": "कागदी नोटांचे मायाजाल! | Tarun Bharat", "raw_content": "\nवीर संघवी, ज्येष्ठ पत्रकार\nउजव्या विचारसरणीला एक मंच उपलब्ध होईल म्हणून पुद्दुचेरी साहित्य उत्सव रद्द करण्याची डाव्यांची मागणी विचित्र...\nप्रशांत उमराव, वकील, सर्वोच्च न्यायालय\nमेरठमध्ये हेलिकॉप्टरमधून शिवभक्त कावडियांवर फुलांचा वर्षाव करणारे मेरठ भागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांना...\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळात एकाच दिवशी शंभर बळी\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nआयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ\nअजित वाडेकर यांचे निधन\nकेरळमध्ये पावसाचे ७७ बळी; १८ हजार बेघर\nवीर संघवी, ज्येष्ठ पत्रकार\nAll अर्थ कृषी नागरी न्यायालय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nआयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ\nअजित वाडेकर यांचे निधन\nसीआरपीएफला सर्वाधिक शौर्य पदके\nमहाराष्ट्राला ५१ पोलिस पदके\nहवाई दल जवानाच्या वेषात अतिरेकी\nराजीव गांधींनीच नाकारला होता दलितांचा हक्क\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nरस्ता सुरक्षा विषय अभ्यासक्रमात असावा\nडिजिटल व्यवहारांवर २० टक्के कॅशबॅक\nघर, वाहनकर्ज महागले; व्याजदरात ०.२५ टक्क्यांची वाढ\nमहसूल वाढल्याने जीएसटी घटणार\nनिर्देशांक नव्या विक्रमी उच्चांकावर\n‘डिमांड ड्राफ्ट’च्या नियमात बदल\nडॉलरसमोर रुपया सक्षम, मोदी सरकार धैर्यवान\nदेशभर आज जीएसटी दिवस पाळणार\nआर्थिक सल्लागार भारतीय मूल्ये जोपासणारा असावा\nसरकारी बँकांमध्ये लोकांचा पैसा सुरक्षित\nनागरिकांना प्रामाणिकपणे कर भरण्याची विनंती\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nविदर्भ, मराठवाड्यातील आठ सिंचन प्रकल्पांना केंद्राची मदत\nयंदा ९७ टक्के पाऊस\nहमीभावात दीडपट वाढ होणारच\nशेतीपर्यंत पाणी नेण्याची गरज : नितीन गडकरी\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nआयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ\nअजित वाडेकर यांचे निधन\nसीआरपीएफला सर्वाधिक शौर्य पदके\nमहाराष्ट्राला ५१ पोलिस पदके\nहवाई दल जवानाच्या वेषात अतिरेकी\nराजीव गांधींनीच नाकारला होता दलितांचा हक्क\nरस्ता सुरक्षा विषय अभ्यासक्रमात असावा\nछत्तीसगडचे राज्यपाल बलरामजी दास टंडन यांचे निधन\nउच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र\nआंदोलनात कोट्यवधींची संपत्ती नष्ट होणे भीषणच\nराजीव गांधींच्या मारेकर्‍यांना मुक्त करण्यास केंद्राचा नकार\nबार डान्समध्ये अश्‍लील काय\nनॅशनल हेरॉल्ड प्रकरणी राहुल गांधींना दिलासा नाही\nक्रमांक ३ वरच न्या. जोसेफ यांचा शपथविधी\nजम्मू-काश्मीरच्या कलम ३५-ए वर उद्या सुनावणी\nतीन न्यायमूर्तींची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती\nन्यायाधीशपदी नातेवाईकांच्या नियुक्तीला चाप लागणार\nपीडित बालकांच्या कुठल्याही छायाचित्राला प्रसिद्धी नको\nशबरीमलात महिलांनाही प्रवेशाचा अधिकार\nपंतप्रधान मोदींनी दिल्या इम्रान खान यांना शुभेच्छा\nट्रम्प यांना प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे निमंत्रण\nकाश्मीरची बदनामी करणार्‍या रिपोर्टमागे पाकिस्तानचा हात\nकोरियन द्वीपकल्पातील शांतता प्रक्रियेत भारताचा सहभाग\nभारत घेणार रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली\nसेशेल्समध्ये भारत उभारणार नाविक तळ\nऑगस्टावेस्टलँड : दलालाचे प्रत्यार्पण करण्यास इटलीचा नकार\nराष्ट्रपती तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना\nभारत-ब्रिटनमध्ये होणार प्रत्यार्पण करार\nबांगलादेश परत घेणार आपले ३३ घुसखोर\nइराणवरील बंधनांना भारताचा पाठिंबा नाही\nवाटले नव्हते, ही व्यक्ती पंतप्रधान होईल\nपंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा नाही : शरद पवार\nघुसखोरांचे आदरातिथ्य करायचे का\nएक राष्ट्र, एक निवडणुकीला काँग्रेसचा विरोध\nमोदी सरकारविरुद्ध आंदोलन उभारणार\nअमित शाह महिन्यातून तीन दिवस बंगाल मुक्कामी…\n१७ विरोधी पक्षांना हवी मतपत्रिका\n…तर भारतात रक्ताचे पाट वाहतील\nकाँग्रेसने मान्य केला बोफोर्स घोटाळा\nखटल्याच्या भीतीने राहुल यांचे ते भाषणच काढले\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\nबुलेट ट्रेनसाठी बीईएमएल बनवणार सुटे भाग\n‘बुल’ उधळला: विक्रमी उच्चांकावर विराजमान\nकाँग्रेसच्या भीतीने हादरला होता शेअर बाजार\nभारती एअरटेल, पेमेंट बँकेचा ईकेवायसी परवाना रद्द\nदूरसंचार क्षेत्रात ७५ हजार कर्मचार्‍यांना नारळ\nऐतिहासिक… निर्देशांक ३३ हजारी\nगुंतवणूकदार २५ लाख कोटींनी मालामाल\nरजनीशकुमार स्टेट बँकेचे नवे अध्यक्ष\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nभारतातच तयार होणार सुपर हॉर्नेट\nआयआरएनएसएस-१ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nनेव्हिगेशनल उपग्रहाचे उद्या प्रक्षेपण\n‘जी-सॅट-६ ए’ चे यशस्वी प्रक्षेपण\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nसंरक्षण मंत्रालयाकडून व्यवहार नाही\nसीमेजवळ तैनात होणार चिनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॉकेट\nलष्कराला मिळणार ४०० आधुनिक तोफा\nभीष्म व अजेय रणगाड्यांना स्वदेशी इंजीन\nसीआरपीएफ जवानांना नवे बुलेट प्रूफ जॅकेट\nइसिसचा अतिरेकी अडकला गुप्तचर यंत्रणेच्या जाळ्यात\nसौराष्ट्र सीमेवर पाकची लढाऊ विमाने\nकोणत्याही आव्हानासाठी लष्कर सज्ज\nअग्नी-५ लवकरच लष्कराच्या शस्त्रागारात\nजवानांना १० हजार रुपये कापड भत्ता\nसर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ आला समोर\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nरोहिंग्या निर्वासित नसून, बेकायदेशीर घुसखोरच : किरेन…\n६१,१६४ किमी महामार्गाची कामे सुरू\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान :…\nस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\nनोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन\nपाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात\n२१ हजारांपेक्षा जास्त भारतीयांचे अमेरिकेत अनधिकृत वास्तव्य\nइराणविरोधात अमेरिकेचे एकतर्फी कठोर फेरनिर्बंध\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान :…\nस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\nनिवडणूक नियमाचे उल्लंघन, इम्रान खान यांचा लेखी…\nइम्रान खान यांना खासदारकीची शपथ घ्यायला सशर्त…\n६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू\nअंटार्क्टिकात तुटला अतिविशाल हिमनग\nनोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन\nभारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था\nमल्ल्याची इंग्लंडमधील मालमत्ता जप्त करण्याचे आदेश\nरासायनिक शस्त्रास्त्र वापर बंदीसंबंधित परिषदेला भारताचा पाठिंबा\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nकॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा\nमुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी\nराज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड\nमराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार\nसमृद्धी महामार्गासाठी एकराला ५० लाख रुपये\n‘चाकण पेटवणार्‍या’ पाच हजार जणांवर गुन्हा\nकमी शब्दात व धारदार पोस्ट असावी\nआता घेता येणार वारीचे लाईव्ह दर्शन\nकर्जमाफी कायमस्वरूपी तोडगा नाही : उपराष्ट्रपती\nऔरंगाबादेत पाणीयुद्ध; नळ कापण्यावरून दोन गटात भीषण…\nआता अयोध्येत मंदिर बांधण्यासाठी जाणार\nवंचितांना यमगरवाडी प्रकल्पाने मुख्य प्रवाहात आणले: भैय्याजी…\nनांदेड महानगरपालिकामध्ये कॉंग्रेसची सत्ता\nमुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी\nतुम्ही फक्त चित्रपट दाखवण्याचे काम करा\nसत्ता मिळाली नाही तरी चालेल, पण भाजपा…\nभाजपाने काँग्रेस, राकाँ फोडली असती, म्हणूनच सत्तेत…\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे…\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nगामा पैलवानसह सहा आरोपी अटकेत\nआजपासून फिफा विश्‍वचषकाची जादू\n फुलराणीने दिले २६ वे सुवर्णपदक\nभारताची सुवर्णझळाळी; एकाच दिवशी १७ पदकांची लूट\nतेजस्विनी, अनिश, बजरंगला सुवर्ण\nकुस्तीपटूंना दोन सुवर्णांसह चार पदके\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nशेअर बाजार नव्या शिखरावर\nशेअर बाजाराचा बैल उधळला\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nध्रुपद गायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे निधन\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nतेरा वैभव अमर रहे माँ\nतेरा वैभव अमर रहे माँ\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\n७३ टक्के नागरिकांचा पंतप्रधान मोदींवर विश्‍वास\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\n‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित\nचिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार\nप्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\nअटल, अढळ आणि अमर…\nअटलजी आजचे श्यामाप्रसाद आहेत\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nअटल, अढळ आणि अमर…\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\nअटलजी आजचे श्यामाप्रसाद आहेत\nमेरा परिचय : अटलजींच्या काव्यप्रतिभेतून प्रकटलेले हिंदुसूक्त\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन…\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nराष्ट्रीय एकता दिनानिमित्त ‘एकतेसाठी दौड’\nपरराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज भूतानमध्ये\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची श्री मंजुनाथस्वामी मंदिरात…\nदशम: सौंदर्यलहरी पारायणोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरूत\nनरेंद्र मोदी यांचे नवे मंत्रिमंडळ\nनव्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन्\nश्री गजानन महाराजांची पालखी पंढरपूर वारीहून परतली\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम…\nविधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान\nAll ई-आसमंत ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१२ ऑगस्ट १८ आसमंत\n०५ ऑगस्ट १८ आसमंत\n२९ जुलै १८ आसमंत\n२२ जुलै १८ आसमंत\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१५ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१४ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n०९ मे १८ सदाफुली\n२७ डिसेंबर १७ सदाफुली\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१५ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१४ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळात एकाच दिवशी शंभर बळी\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…\nवृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…\nजनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nवृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…\nस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\n►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…\n►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…\nकॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा\n►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…\nमुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी\n►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…\nराज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड\n►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…\nतेरा वैभव अमर रहे माँ\n॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…\n॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…\n॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…\n‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित\nअभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…\nचिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार\nऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…\nसंजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…\nसूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49\nHome » आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक » कागदी नोटांचे मायाजाल\n॥ अर्थपूर्ण : यमाजी मालकर |\nकागदी नोटांनी जगावर काय वेळ आणली आहे, याचा एक अंक सध्या दक्षिण अमेरिकन देश व्हेनेझुएलात पाहायला मिळतो आहे. चार वर्षांपूर्वीच या संकटाने झिम्बाब्वेच्या चलनाचा बळी घेतला, अखेर आपले चलन सोडून इतर देशांचे चलन त्या देशाला मान्य करावे लागले. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीसारख्या देशाने या वेदना सहन केल्या आहेत. या संकटाला मराठीत पैशीकरण म्हणता येईल. इंग्रजीत त्याला ोपशींळूरींळेप म्हणतात. याचा अर्थ असा की, एखादे चलन प्रस्थापित करणे. पण, ते करताना खर्‍या मूल्याची जेव्हा फारकत होते, तेव्हा पैशीकरणाचे संकट उभे राहते. असे संकट व्हेनेझुएलामध्ये सध्या उभे राहिले आहे. विश्‍वास बसत नाही, पण बातम्यांत असे म्हटले आहे की, तेथे या वर्षी १० लाख पट महागाई वाढणार आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने हा अंदाज केला आहे.\nव्हेनेझुएला देशात उत्पनाचा मूळ स्रोेत तेलसाठे आहेत. पण, २०१४ मध्ये तेलाच्या किमती इतक्या कमी झाल्या की, त्या देशाची अर्थव्यवस्था कोसळण्यास सुरवात झाली. सरकारची तिजोरी रिकामी झाल्यामुळे सरकारने सब्सिडी देणे थांबविले तसेच किमतीवर नियंत्रण करणे सरकारला शक्य राहिले नाही. तेथे साम्यवादी व्यवस्था असल्याने अर्थव्यवस्थेवर संपूर्ण नियंत्रण सरकारचे आहे. झिम्बाब्वेमध्ये २००० साली आणि जर्मनीमध्ये १९२३ साली जशी परिस्थिती निर्माण झाली होती, तशीच स्थिती व्हेनेझुएलामध्ये वर्षअखेर निर्माण होईल, असे नाणेनिधीने म्हटले आहे.\nव्हेनेझुएलाची आजची स्थिती काय आहे तेथे प्रचंड महागाई वाढली आहे. या वर्षी ती ४६ हजार ३०५ पट वाढली. ही महागाई किती आहे, याची कल्पना येण्यासाठी भारतातील महागाईच्या प्रमाणाचे उदाहरण आपण घेऊ. भारतात सध्या पाच टक्के महागाई वाढली आहे. त्यात तेलाचा वाटा अधिक आहे. अशा स्थितीत आपल्याला महागाई सहन करणे अशक्य होऊन जाते, मग ४० हजार पट महागाई कशी असू शकेल, याच्या नुसत्या कल्पनेने धडकी भरते.\nआता हे कशामुळे झाले, हे समजून घेऊ. तेलापासून मिळणारे हक्काचे उत्पन्न कमी झाल्यामुळे सरकारचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्‍न पडला, तेव्हा सरकारने चलन अधिक छापण्याचा निर्णय घेतला. म्हणजे पुरेशी निर्मिती किंवा उत्पादन नसताना नोटा छापण्यात आल्या. चलन किती छापायचे, हा अधिकार सरकारकडे असला, तरी मागणी आणि पुरवठ्याचे सूत्र सांभाळले नाही तर अशी परिस्थिती निर्माण होते. नोटांच्या अशा छपाईमुळे व्हेनेझुएलाच्या चलनाचे जगातील मूल्य एकदम घसरले. त्यामुळे जगातून माल आयात करणे कठीण झाले. त्या देशाची आर्थिक स्थिती खालावत गेली. एकदा गाडी उताराला लागली की ती थांबविणे अशक्य होऊन जाते, असेच जर्मनी आणि झिम्बाब्वेमध्येही झाले होते. व्हेनेझुएलामध्ये आर्थिक संकटामुळे दंगली होत आहेत. देश अस्वस्थ, अशांत झाला आहे. सर्वसामान्य माणसाला जगणे मुश्कील झाले आहे.\nजगात अशी वेळ आगामी काळात अनेक देशांवर येऊ शकते, याचे कारण अमेरिकेसह जगाने गोल्ड स्टँडर्डला दिलेली सोडचिठ्ठी. गोल्ड स्टँडर्ड याचा अर्थ देशाच्या तिजोरीत जेवढे सोने ठेवले जाते, तेवढ्या किमतीचे चलन छापणे. सोनेच का, कारण सोने जगात कमी आहे. त्यामुळे ते मौल्यवान आहे. वेगळ्या भाषेत ती रियल व्हॅल्यू आहे. जशी जमिनीला आहे, पाण्याला आहे, खनिज संपत्तीला आहे, अन्नधान्याला आहे. पूर्वी जेव्हा कागदी चलन वापरात आले नव्हते, तेव्हा अन्नधान्याच्या देवघेवीवरच जग चालत होते. व्यापाराचा विस्तार झाल्यामुळे सोने-चांदीसारखे धातू देवघेवीसाठी वापरले जाऊ लागले. पण तेही सोयीचे ठरत नाहीत, हे लक्षात आल्यावर सध्याच्या चलनाचा जन्म झाला. पण, जोपर्यंत म्हणजे ६० वर्षापूर्वी त्याच्या पाठीशी सोने होते, (गोल्ड स्टँडर्ड) तोपर्यंत चलनवाढ या वेगाने होत नव्हती. चलन छापण्यासाठी सोने तिजोरीत ठेवायचे म्हणजे तेवढ्या किमतीचे उत्पादन आधी करावे लागत होते. चलन छापण्यासाठी प्रत्येक देश आपले काही निकष आताही पाळत असला, तरी त्या त्या देशांनी त्यात आपल्या सोयीने बदल केले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात किती चलन छापले जाते आहे, हे गुलदस्त्यातच आहे. झिम्बाब्वेमध्ये गेल्या दशकात तेच झाले. एक अब्ज झिम्बाब्वेन डॉलरची नोट घेऊन लोक हॉटेलमध्ये जेवणासाठी जाऊ लागले कागदी नोटांना काही किंमतच राहिली नाही.\nया संकटापासून वाचण्याचा एकच मार्ग म्हणजे चलन आणि उत्पादन याचा संबंध कायम ठेवणे आणि ही आर्थिक शिस्त न मोडणे. आपल्या देशात ५०० आणि १००० रुपयांच्या स्वरूपातील चलन एकूण चलनाच्या ८६ टक्के होते आणि त्यामुळे रोखीचे व्यवहार माजले होते. त्यामुळेच घरे, जमिनी याचे दर प्रचंड वाढले होते. ज्यांना कागदी नोटा कमावण्याची अक्कल आहे, तो शहाणा आणि श्रीमंत. त्यामुळे कागदी नोटांचा वापर करून आपल्याकडे गेल्या काही वर्षांत निसर्गाची प्रचंड लूट केली गेली. जमिनीची मालकी नोकरदार आणि उद्योजक, व्यावसायिकांकडे जाते आहे, त्याचेही हेच कारण आहे. ज्या वेळी धान्य हाच पैसा होता, त्या वेळी शेतकरी श्रीमंत होता. आता शेतकर्‍याला इच्छा असो नसो, बाजारात जाऊन कागदी नोटा कमवाव्या लागतात. मानवी आयुष्याचे हे जे पैशीकरण झाले आहे, ते मोठे संकट असून चलनाला काबूत ठेवणे ही आजची गरज आहे. नोटबंदीने ते काम केले आहे. विकासाचा वेग कमी झाला, जमीन आणि घरांच्या किमती कमी झाल्या, सोन्याची आयात कमी झाली, अशी तक्रार काही जण करतात, पण ती गरज होती. त्यामुळे अर्थव्यवस्थेची सूज कमी झाली.\nअर्थात, जगाचे चलन एक असले पाहिजे, इथपर्यंत हा प्रवास गेला पाहिजे. पण, आज तो अनेकांना फार लांबचा पल्ला वाटतो. वास्तविक, मानवी आयुष्याचे ज्या वेगाने पैशीकरण होते आहे, ते पाहता ते फार लवकर व्हायला हवे आणि जगाची गरज म्हणून ते होईलच. जर्मनी, झिम्बाब्वे, व्हेनेझुएलात जे झाले ते भारतात होऊ नये, याचा मार्ग चलनाच्या वापरावर नियंत्रण हवे. ते कसे शक्य होईल, ते अर्थक्रांती बँक व्यवहार कराच्या मार्गाने सांगते. आर्थिक साक्षरतेत आपला समाज कमी पडत असल्याने त्याचे महत्त्व आज आपल्याला नाही. पण, नजीकच्या भविष्यात सार्‍या जगाला त्यावरच चर्चा करून पुढे जावे लागेल.\nतेरा वैभव अमर रहे माँ\nनकारात्मकतेमध्येच सत्तेची किल्ली शोधणार्‍यांकडे दुर्लक्ष करा\nअंध असूनही दीपस्तंभ : ५० कोटींच्या कंपनीचा सीईओ\nFiled under : आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक.\nआजपासून फिफा विश्‍वचषकाची जादू\n फुलराणीने दिले २६ वे सुवर्णपदक\nभारताची सुवर्णझळाळी; एकाच दिवशी १७ पदकांची लूट\nतेजस्विनी, अनिश, बजरंगला सुवर्ण\nकुस्तीपटूंना दोन सुवर्णांसह चार पदके\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळात एकाच दिवशी शंभर बळी\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nSAMB on मग न्यायाधीशांसाठी तरी का उभे राहायचे\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nमग न्यायाधीशांसाठी तरी का उभे राहायचे\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\n७/१२ प्रभागाचा : सोलापूर महानगरपालिका निवडणूक २०१७\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (150) आंतरराष्ट्रीय (467) अमेरिका (166) आफ्रिका (7) आशिया (259) ऑस्ट्रेलिया (2) युरोप (32) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (1) ई-पेपर (159) ई-आसमंत (59) ई-मराठवाडा (48) ई-सदाफुली (4) ई-सोलापूर (48) कलाभारत (4) किशोर भारत (2) क्रीडा (20) छायादालन (36) ठळक बातम्या (8) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (886) आसमंत (841) मानसी (10) युवा भरारी (9) विविधा (4) सदाफुली (22) फिचर (16) महाराष्ट्र (435) उ.महाराष्ट्र (3) प.महाराष्ट्र (15) मराठवाडा (5) मुंबई-कोकण (87) विदर्भ (11) सोलापूर (17) रा. स्व. संघ (48) राज्य (738) आंध्र (12) ईशान्य भारत (42) उत्तर प्रदेश (100) ओडिशा (3) कर्नाटक (80) केरळ (31) गुजरात (98) गोवा (11) जम्मू-काश्मीर (94) तामिळनाडू (35) दिल्ली (52) पंजाब-हरयाणा (28) बंगाल (31) बिहार-झारखंड (66) मध्य प्रदेश-छत्तीसगड (21) राजस्थान (21) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,864) अर्थ (76) कृषी (25) नागरी (822) न्यायालय-गुन्हे (262) परराष्ट्र (83) राजकीय (261) वाणिज्य (13) विज्ञान-तंत्रज्ञान (35) संरक्षण (143) संसद (126) सांस्कृतिक (18) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (5) संपादकीय (795) अग्रलेख (382) उपलेख (412) साहित्य (11) स्तंभलेखक (1,031) अजय देशपांडे (34) अपर्णा क्षेमकल्याणी (10) अभय गोखले (25) अविनाश कोल्हे (10) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (29) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (45) डॉ.परीक्षित स. शेवडे (30) डॉ.वाय.मोहितकुमार राव (28) डॉ.सच्चिदानंद शेवडे (28) तरुण विजय (9) दत्ता पंचवाघ (10) दीपक कलढोणे (36) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (3) ब्रि. हेमंत महाजन (55) भाऊ तोरसेकर (111) मल्हार कृष्ण गोखले (52) यमाजी मालकर (35) योगानंद काळे (1) रत्नाकर पिळणकर (27) रमेश पतंगे (11) रविंद्र दाणी (57) ल.त्र्यं. जोशी (19) वसंत काणे (18) श्याम परांडे (20) श्याम पेठकर (55) श्यामकांत जहागीरदार (57) श्रीकांत पवनीकर (10) श्रीनिवास वैद्य (48) सतीष भा. मराठे (6) सुधीर पाठक (6) सुनील कुहीकर (52) सोमनाथ देशमाने (34) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (26)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nMore in आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक (33 of 1276 articles)\nनकारात्मकतेमध्येच सत्तेची किल्ली शोधणार्‍यांकडे दुर्लक्ष करा\n॥ रोखठोक : हितेश शंकर | जातीय विद्वेष पसरवून, सांप्रदायिकतेची आग भडकवित भारताला खाली बघायला लावणार्‍या मुद्यांचे ढोल वाजवत पुढे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/indian-bank-recruitment-2018-jobs-bank-po/", "date_download": "2018-08-18T07:58:55Z", "digest": "sha1:C2OWDAENV4GTYFPSBT5S7CTRMFAK2RUX", "length": 6178, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इंडियन बँकेमध्ये नोकरीची संधी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nइंडियन बँकेमध्ये नोकरीची संधी\nनवी दिल्ली – इंडियन बँकेमध्ये प्रोबेशनरी आॅफिसर पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून (1 आॅगस्ट) सुरू करण्यात आलेली आहे.याबदल आज नोटीफेकेशन जाहीर करण्यात आलेले आहे. प्रोबेशनरी पदाच्या एकूण 417 जागा उपलब्ध आहेत. उमेदवार 27 आॅगस्टपर्यत अाॅनलाईन अर्ज करू शकतात.\nजर तुम्हाला या पदाकरीता अर्ज करायचा असेल तर किमान पदवीधर असणे गरजेचे आहे. उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षादरम्यान असावे. उमेदवाराची निवड पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या माध्यमातून होईल. पूर्व परिक्षा 6 आॅक्टोबरला होईल तर 4 नोव्हेंबरला मुख्य परीक्षा होईल. अधिक माहितीसाठी उमेदवार इंडियन बॅकेच्या संकेतस्थळावर ( indianbank.in ) जाऊन अर्ज करू शकता.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसाताऱ्यात अतिक्रमण विभागाची कारवाई\nNext articleआधुनिकीकरणाअभावी माण बाजार समितीची मान खाली\nनिम्म्या कर्नाटकवर दुष्काळाचे सावट; मात्र काही भागांत पूरस्थिती\nकाश्‍मीरमधील ग्रेनेड हल्ल्यात एकाचा मृत्यूू, तिघे जखमी\nछत्तीसगडमध्ये भिंत कोसळून तीन ठार\nसात दिवस केरळमध्ये फोन कॉल आणि मोबाईल डाटा वापर विनामुल्य\nतिबेटींचे समर्थक होते अटलजी – दलाईलामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/information-about-the-students-of-isro/", "date_download": "2018-08-18T07:58:50Z", "digest": "sha1:FUIGY6UE6JCNC3E43VOPFCCSGBYZJFOL", "length": 7377, "nlines": 134, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इस्त्रो विषयी विद्यार्थ्यांना मिळणार माहिती | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nइस्त्रो विषयी विद्यार्थ्यांना मिळणार माहिती\nपिंपरी- भारतीय अवकाश विज्ञान संस्थेचे संस्थापक वैज्ञानिक डॉ. विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दीनिमित्त (दि. 12) त्यांच्या कार्याविषयी तसेच इस्त्रोची माहिती विद्यार्थी व पालकांना मिळणार आहे. या उपक्रमासाठी चिंचवड एमआयडीसी येथील विकास शिक्षण संस्थेच्या श्री शिव छत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाची निवड करण्यात आली आहे.\nया कार्यक्रमास पुण्यातील इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क, इस्त्रो अहमदाबाद आणि खगोल शिक्षण फोरम या संस्थांचे सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे इस्त्रो सेलचे अध्यक्ष डॉ. एम. सी. उत्तम, जयंत जोशी, डॉ. सी. एम. नागराणी आणि वैज्ञानिक अरूणकुमार सिन्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या प्रसंगी अवकाश विज्ञानातील विज्ञान फिल्म शो, इस्त्रोद्वार निर्मित चंद्रयान मोहीम, मंगळ मोहीम, प्रदर्शन आणि विज्ञान प्रश्‍न मंजूषा आदी कार्यक्रमांची विद्यार्थ्यांसाठी रेलचेल असणार आहे, अशी माहिती श्री शिव छत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अण्णासाहेब जाधव यांनी दिली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगोयला गंगा ग्रुपला सर्वोच्च न्यायालयाचाही दणका\nNext articleप्रकल्प मंजुरीसाठी एक खिडकी योजना; पर्यावरण, वनविषयक मंजूरी ऑनलाईन मिळणार\nरिक्षाचालकांचे प्रश्‍न मार्गी लावणार -पालकमंत्री गिरीश बापट\nकारागृहातील कैद्यांना विशेष माफी मिळणार ; केंद्र सरकारचा निर्णय \nबारामतीत पहिले पाढे पंच्चावन्न \nखासदार सुळेंनी धरला झिम्मा फुगड्यांचा फेर\nमातृभाषांची जपणूक करणे प्रत्येकाचे कर्तव्य- राज्यपाल सी. विद्यासागर राव\nदुर्मीळ वृक्षांची अनोखी दिंडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A/", "date_download": "2018-08-18T08:01:13Z", "digest": "sha1:C6QPBMMV2L73MIQXRJD6BLQAOAXXF57U", "length": 6696, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाद सोडवणाऱ्या भावांवरच चाकू हल्ला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवाद सोडवणाऱ्या भावांवरच चाकू हल्ला\n– चौघांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात\nपिंपरी – गल्लीतून वेगात गाडी चालवण्यावरुन सुरु असलेले भांडण सोडवण्यास गेलेल्या तीन भावांवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री नऊ वाजता थेरगाव येथे घडली.\nयाप्रकरणी वाकड पोलिसांनी अनिकेत हरिषचंद्र काळे, रवींद्र जगदीश पोखरकर, हृषीकेश हरेराम पांचाळ, आदेश दिलीप बालवडकर यांना अटक केली आहे. तर एक अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात प्रितम जयरवींद्र अडसूळ (वय-24), प्रेम जयरवींद्र अडसूळ (वय-27), संदीप अडसूळ व केरबा मगर हे जखमी झाले आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप उभा असताना आदेश हा त्याच्या समोरुन एकदम वेगात गाडी चालवत गेला. यावेळी संदीपने त्याच्या जवळच उभ्या असलेल्या अनिकेतला त्याबद्दल आदेशला समजवण्यास सांगितले. अनिकेत याने आदेशला बोलवून समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता संदीप याच्याशी भांडण सुरु केले.\nआपल्या भावा सोबत सुरु असलेले भांडण सोडवण्यासाठी प्रेम व प्रितम त्याठिकाणी आले. अनिकेत व आदेश यांनी त्यांना मारहाण करत गळा दाबून चाकूने वार केले. यावेळी मध्यस्थी करणाऱ्या केरबालाही दुखापत झाली. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकैद्यांना मिळणार माफी (भाग-१)\nNext articleराजगुरूनगरात सहाय्य पोलीस निरीक्षकपदी येळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%A8_%E0%A4%8F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%96", "date_download": "2018-08-18T08:59:44Z", "digest": "sha1:B7XGHNIX6DODRPPPSAQUZGIEBLBCYXTU", "length": 4005, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जोनाथन एर्लिख - विकिपीडिया", "raw_content": "\nशेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.\nकृपया टेनिस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nटेनिस खेळाडू विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १८:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.mahabhatkanti.com/maharashtra/destinations/trekking", "date_download": "2018-08-18T08:27:51Z", "digest": "sha1:LIARHGQIXWI5OZL4FCSAZ6G4EIFDPZVO", "length": 3218, "nlines": 70, "source_domain": "www.mahabhatkanti.com", "title": "Trekking in Maharashtra | Mahabhatkanti", "raw_content": "\nपुणे - मुंबईमधील ट्रेकर्सना जवळपासचा सर्वात उत्तम ट्रेक कोणता असा प्रश्न विचारला तर एकच उत्तर येईल - हरिश्र्चंद्रगड (Harishchandragad). अहमदनगर जिल्ह्यामध्ये असणारे हे प्राचीन ठिकाण ट्रेकर्सना नेहमीच खुणावत असते. ठाणे, अहमदनगर आणि पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमारेषेवर असणारा हरिश्र्चंद्रगड आणि त्याच्या आजुबाजूला असणारी इतर भटकंतीची ठिकाणे ही पर्यटकांसाठी मेजवानीच आहे.\nसिंहगड रस्ता, पुणे 411030\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://punerispeaks.com/tag/thunderstorm/", "date_download": "2018-08-18T08:38:31Z", "digest": "sha1:KTPCTHFYRAYJFJSISNZSZ6REGLCSGJNJ", "length": 2475, "nlines": 59, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Thunderstorm Archives - Puneri Speaks", "raw_content": "\nपावसाळ्यात वीज चमकत असताना घ्यावयाची काळजी\nपावसाळ्यात वीज चमकत असताना घ्यावयाची काळजी वीज एका ठिकाणी फक्त एकाच वेळेस पडते- हा एक गैरसमज असून वीज अनेक ठिकाणी … Read More “पावसाळ्यात वीज चमकत असताना घ्यावयाची काळजी”\nAsian Games 2018: आशियाई क्रीडा स्पर्धा वेळापत्रक, प्रक्षेपण, कबड्डी संघ वेळापत्रक\nपिंपरीत प्रियकराने ‘Shivde, I Am Sorry’ चे ३०० फलक लावले, कोण आहे शिवडे\nअटल बिहारी वाजपेयी माहिती, अटल बिहारी वाजपेयी विशेष , अटल बिहारी वाजपेयी मराठी, अटल बिहारी वाजपेयी कविता\nपुणे तिथे काय उणे: देशात राहण्यासाठी पुणे शहर अव्वल स्थानी\nआरक्षण – एक शोधनिबंध | आरक्षण माहिती | आरक्षण म्हणजे काय\nRaj Thackeray VS Ajit Pawar: पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळ्यात एकमेकांवर टीका, वॉटरकप 2018 विजेते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/so-you-stay-safe-travel-53778", "date_download": "2018-08-18T08:26:41Z", "digest": "sha1:SAMNPIOHVPYPNOU26AROB6Z4UHMKA2FF", "length": 15337, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "So you stay safe on travel! …त्यामुळे तुम्ही प्रवासातही रहाल सुरक्षित!! | eSakal", "raw_content": "\n…त्यामुळे तुम्ही प्रवासातही रहाल सुरक्षित\nसोमवार, 19 जून 2017\nव्हिसासाठी अर्ज करणे, तिकिटे आरक्षित करणे आणि विमानप्रवास या व्यतिरिक्तही सुटीला एक महत्त्वाचा आयाम असतो, तो प्रवास विम्याचा. काही अनपेक्षित दुर्घटना घडली, तर प्रवास विम्यामुळे त्यापासून तुमचे संरक्षण करणे शक्य होऊन तुमची सुटी तुम्ही अधिक शांततेत व्यतीत करू शकता.\nतुम्ही एकदा विम्याचे कवच घेतले, की तुमची सर्व कागदपत्रे योग्य क्रमाने लावली आहेत ना, तुमच्या प्रवासाच्या सामानात ती व्यवस्थित ठेवली गेली ना, याची खात्री करून घ्या.\nप्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी पुढील काही गोष्टींची खात्री करून घ्या,\nव्हिसासाठी अर्ज करणे, तिकिटे आरक्षित करणे आणि विमानप्रवास या व्यतिरिक्तही सुटीला एक महत्त्वाचा आयाम असतो, तो प्रवास विम्याचा. काही अनपेक्षित दुर्घटना घडली, तर प्रवास विम्यामुळे त्यापासून तुमचे संरक्षण करणे शक्य होऊन तुमची सुटी तुम्ही अधिक शांततेत व्यतीत करू शकता.\nतुम्ही एकदा विम्याचे कवच घेतले, की तुमची सर्व कागदपत्रे योग्य क्रमाने लावली आहेत ना, तुमच्या प्रवासाच्या सामानात ती व्यवस्थित ठेवली गेली ना, याची खात्री करून घ्या.\nप्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी पुढील काही गोष्टींची खात्री करून घ्या,\n- तुम्ही प्रवासासाठी घेऊन जाण्याच्या गोष्टींची यादी करत असाल, तर त्यामध्ये तुमच्या प्रवास विम्याशी संबंधित कागदपत्रांचा समावेश झाला आहे ना, याची खात्री करा. यामुळे तुम्हाला विमा पुरवठादारापर्यंत विनाअडथळा पोहोचणे शक्य होईल.\n- तुमच्या मोबाइल फोनमध्ये सर्व कागदपत्रांचे दस्तावेजीकरण करा. तुमच्या प्रवासाच्या बॅगचे आणि त्यातील वस्तूंचे एक छायाचित्र घेऊन ठेवा. म्हणजे तुमची बॅग हरवली किंवा चोरीला गेली, तर विमा पुरवठादारांना तुमच्या बॅगमध्ये काय काय होते, याची माहिती पुरवणे तुम्हाला शक्य होईल.\n- एखादी दुर्घटना किंवा अपघाताच्या वेळी, तुमच्या विमा पुरवठादाराशी दिलेल्या कालावधीत संपर्क साधा. विमा कंपनीच्या कॉल सेंटरशी किंवा ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून त्यांना सहल रद्द झाल्याची, प्रवासाच्या दिवसांची, बॅग हरवल्याची, विमान चुकल्याची किंवा वैद्यकीय तातडीची लगेच माहिती द्या.\n- विमा पुरविणा-याशी तुम्ही जेव्हा संपर्क साधता, तेव्हा त्यांना जितके तपशील पुरवता येतील, तेवढे पुरवा. यानंतर तुम्हाला विमा पुरवठादाराकडून आलेला विम्याच्या हमी रकमेसाठीचा अर्ज भरता येऊ शकेल.\nप्रवास विम्यासाठी अर्ज करताना वस्तू हरवल्याचा, प्रवासाला झालेला उशीर किंवा आजार याचा पुरावा देणे आवश्यक आहे. यातील आवश्यक गोष्टींमध्ये चोरी किंवा इतर गुन्ह्याच्या बाबतीत पोलिस अहवाल, विमानात प्रवासाचे सामान हरवले असल्यास विमान कंपनीचे लेखी जबाब, प्रवासात वैद्यकीय मदत घेतली असेल, तर त्याचे तपशील आदींचा समावेश होतो.\nतुम्ही प्रवासाचे सामान भरताना, तसेच पर्यटनाच्या ठिकाणी पोहोचल्यावरही हे काही सोपे नियम पाळले, तर कोणत्याही आपत्तीच्या वेळी तुम्हाला अडचणी येणार नाहीत. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही विम्याच्या रकमेकरिता अर्ज करण्यासाठी अधिक चांगल्या पद्धतीने तयार राहू शकता आणि प्रवास विम्याचे लाभ मिळवू शकता.\n- डॉ. जयदीप देवरे\n(लेखक महिंद्रा इन्शुरन्स ब्रोकर्स लि.चे व्यवस्थापकीय संचालक आहेत.)\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून सहाजण जखमी\nबेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने बंगळूरकडे जाणारी व्हीआरएलची आराम बस उलटून चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय...\nउंड्री - पाचव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजूर ठार\nउंड्री - गुलाम अली नगर गल्ली नं 6 दि.13 ऑगस्ट दु.12.30 वाजता एका निर्माणाधीन इमारतीचे काम सुरू असताना पाचव्या मजल्यावर पडून राजशेखर माशाले (वय 33...\nरावेतला स्वतंत्र पोलिस चौकीची मागणी\nवाल्हेकरवाडी - रावेत परिसराचा विकास झपाट्याने वाढत आहे, त्याचप्रमाणे गुन्हेगारीही वाढत आहे. रावेत परिसरात गुन्हा घडला अथवा काही कारणास्तव पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=422&Itemid=612&limitstart=4", "date_download": "2018-08-18T08:15:08Z", "digest": "sha1:MIWQVDRJSZX4QH4QEGFDN47K5ZSJEKFK", "length": 3527, "nlines": 40, "source_domain": "saneguruji.net", "title": "संध्या", "raw_content": "शनिवार, आँगस्ट 18, 2018\n“पण मला मुळी लग्नच नाहीं करायचं. मी आपली तुझ्याजवळ राहीन. तुझ्याजवळ गाणीं शिकेन. शेतावर जाईन. फुलं वेंचीन. मोट धरीन. मला मोट आवडते. कसं धो धो पाणी येतं; नाहीं, आजी \n“मघां म्हणालीस की बॅरिस्टराला हटवशील, आणि आतां म्हणतेस कीं वेडी आहेस म्हणून. आजी, खरं सांग,\nमी शहाणी की वेडी \n“आधी अंग पूस. आणि शेवटीं केंस भिजवलेसच ना \n“फार नाहीं कांही भिजले. आजी, डोक्यात शिरूं दे पवित्र पाणी, चंद्रभागेचं भक्तिप्रेमाचं पाणी. आजी, मी जनाबाई होऊं \n“जनाबाई व्हायला पुण्य लागतं. सांगितलं होतं कीं डोकं बुडवूं नकोस म्हणून.”\n“तूं तर तीनतीनदां बुडवतेस आम्हां मुलांना मात्र आडकाठी.”\nशेवटी एकदांची संध्या व भागीरथीकाकू घरीं आलीं. संध्येचे ओले झालेले केंस पाहून आईनें तिला मारलें. संध्या रडूं लागली. आजीनें तिला जवळ घेतलें. तरीहि तिचें मुसमुसणें चालूच होते.\n“आजी, कां ग आईनं मारलं काय मीं पाप केलं काय मीं पाप केलं जरा केस ओले झाले, ही का चूक जरा केस ओले झाले, ही का चूक \n“अग, केंस ओले झाले तर पडसं होतं; आणि तसेच ओले राहिले तर मग उवा पडतात. केसांत जटाहि होतात. आईचं का तुझ्यावर प्रेम नाहीं \n“माझ्यावर कुणाचं प्रेम नाहीं. संध्या कुणालाच नको. बाबा माझ्याशीं कधींसुध्दा बोलत नाहींत. इतर मुलं माझ्याशीं भांडतात. आई मला मारते. मोठी काकू मलाच काम सांगते. रोज मीच आपली भाजी चिरायची.”\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%AC%E0%A5%A6", "date_download": "2018-08-18T09:00:12Z", "digest": "sha1:PNT4C4A7N3MPTF4GAW3TDK6QGLRRB2O7", "length": 5607, "nlines": 200, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ७६० - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ७ वे शतक - ८ वे शतक - ९ वे शतक\nदशके: ७४० चे - ७५० चे - ७६० चे - ७७० चे - ७८० चे\nवर्षे: ७५७ - ७५८ - ७५९ - ७६० - ७६१ - ७६२ - ७६३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nनागभट्ट पहिला, गुर्जर-प्रतिहार राजा.\nइ.स.च्या ७६० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ मे २०१७ रोजी ०२:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/guru/", "date_download": "2018-08-18T08:45:43Z", "digest": "sha1:UFDSCDH4DY6T6CQIMKXMCLVIZIWBIW33", "length": 19709, "nlines": 140, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Guru - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nपरम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १ मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे त्रिविक्रमाच्या रसायनशास्त्राबाबत(Trivikram’s Chemistry) सांगताना मिठाचे उदाहरण देऊन त्रिविक्रमाची अचिंत्य लीला स्पष्ट केली आणि श्रध्दावानाने त्रिविक्रमाचे हे रसायनशास्त्र जाणून त्याला प्रतिसाद कसा द्यावा कुणासाठी काय उचित आहे आणि ते कधी त्याला द्यायचे हे तो त्रिविक्रमच जाणतो व तो ते करत असतो. त्यामुळे त्रिविक्रमाला अटी न घालता त्याने जे दिले आहे त्याचा प्रेमाने स्वीकार\nपरम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २७ मार्च २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे भगवंताबद्दल कुठलाही विकल्प मनात येऊ न देता ठेवता आणि स्वतःचा भगवंतावरील विश्वास जराही डगमगु न देता. मानवाने भगवंतावरील विश्वास अधिकाधिक वाढवला पाहिजे, कारण शेवटी ह्या विश्वासावरच सर्व काही अवलंबून असते. माणसाच्या जीवनात प्रश्नपत्रिकेत त्याला मिळणारे गुण इतर कुठल्याही गोष्टीवर अवलंबून नसून केवळ विश्वासावरच अवलंबून असतात, हे बापूंनी स्पष्ट केले. जे आपण ह्या\nपरम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २७ मार्च २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे त्रिमितीच्या पलीकडे राहून त्रिमितीवर सत्ता गाजवणारा त्रिविक्रम ज्या श्रध्दावानाचा त्याच्यावर पूर्ण विश्वास असतो, त्याच्या जीवनात अचिंत्यलीला घडवून आणतो. त्रिविक्रमाच्या लीलांचा कार्यकारणभाव जाणता येत नाही. त्रिविक्रम आणि विज्ञान(Trivikram & Science) यातील संबंधाबाबत बापूंनी सांगितले. जे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\nपरम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २७ मार्च २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे श्री साईसच्चरितातील लोहारणीची कथा आणि चांदोरकरांची कथा याद्वारे भगवंत त्रिमितीला वाकवून स्वलीलेने भक्ताला कसा सहायक होतो हे बापूंनी सांगितले. पण हे होण्यासाठी विश्वास महत्त्वाचा आहे, “एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा” हा सद्‌गुरु विश्वास ज्या भक्ताच्या ह्द्यात असतो त्या भक्ताला सद्‌गुरुतत्त्वाच्या अचिंत्य लीला अनुभवास येतात असे बापू म्हणाले. जे आपण\nपरम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २० फ़ेब्रुवारी २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे त्रिविक्रमाचा प्रतिनिधि असणाऱ्या जलाचा अध्यात्मिक इतिहास काय आहे, हे सांगीतले. बापूंनी पुढील व्हिडिओमध्ये हा मुद्दा स्पष्ट केला आहे.\nत्रिविक्रमाचा गुणधर्म – जशास तसा ( Characteristics of Trivikram )\nपरम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १३ फ़ेब्रुवारी २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे त्रिविक्रमाच्या ‘जशास तसा’ ह्या गुणधर्माबद्द्ल सांगितले. हा मुद्दा बापूंनी पुढील व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.\nयशस्वी होण्यासाठी स्वत:च स्वत:ची परीक्षा व इंटरव्यू घ्या(Take your own exam to be sucessful)\nगुरुवार, दिनांक ३० जानेवारी २०१४ रोजी झालेल्या प्रवचनामध्ये सद्‌गुरू अनिरुध्द बापू यांनी यशस्वी होण्यासाठी स्वत:च स्वत:ची परीक्षा व इंटरव्यू कसा घ्यावा हे सांगितले. हा पूर्ण मुद्दा पुढील व्हिडीओ मध्ये सविस्तरपणे दिलेला आहे.\nचिंता करण्यापेक्षा प्रार्थना करण्याचे महत्व (pray instead of worrying)\nगुरुवार, दिनांक ३० जानेवारी २०१४ रोजी झालेल्या प्रवचनामध्ये सद्‌गुरू अनिरुध्द बापू यांनी चिंता करण्यापेक्षा प्रार्थना करण्याचे महत्व सांगितले. हा पूर्ण मुद्दा पुढील व्हिडीओ मध्ये सविस्तरपणे दिलेला आहे.\nधारी देवीचा (धारी माता) प्रकोप\nनुकतीच उत्तराखंडमध्ये पूरपरिस्थिती उद्‌भवली त्यात प्रचंड जिवितहानी झाली. आपण ह्याबाबत सार्‍या बातम्या वर्तमानपत्र व वृत्तवाहिन्यांवर बघतच आहोत. कालच्या प्रवचनमध्ये बापूंनी ह्या प्रसंगाचा उल्लेख केला. ह्या गोष्टीशी निगडीत लेख आजच्या दैनिक प्रत्यक्षमध्ये प्रकाशित झाला आहे. तो येथे देत आहोत. चारधाम यात्रा करणार्‍या भाविकांचं संरक्षण धारी देवी करते, असं मानलं जातं. म्हणूनच उत्तराखंडतल्या श्रीनगरमधील अलकनंदा नदीच्या तीरावर असलेल्या धारी देवीचे मंदिर सरकारने पाडू नये, अशी मागणी गेल्या दोन वर्षांपासून केली जात होती.\nकार्यकर्त्यांसाठी झालेल्या ’प्रेमयात्रा – न्हाऊ तुझिया प्रेमे’च्या स्क्रीनिंगवर प्रशांतसिंह तळपदे( Prashant Talpade on NTP) यांचा अभिप्राय\n२६ मे २०१३ – न्हाऊ तुझिया प्रेमे या कार्यक्रमाच्या दिवशी पद्म्श्री डॉ. डी. वाय पाटील स्टेडियममध्ये प्रसादालयात सेवा असल्याने कार्यक्रम पूर्णपणे पाहता आला नाही. मात्र ९ जून रोजी श्रीहरीगुरुग्रामच्या प्रांगणात हा कार्यक्रम चुकलेल्या सर्व कार्यकर्त्यांसाठी हा कार्यक्रम पुन्हा दाखविण्यात आला. बापू ज्याठिकाणी प्रवचन करतात त्या स्टेजवर त्या स्टेजच्याच आकाराएवढ्या भल्या मोठ्या LED Screen वर कार्यक्रम दाखविण्याची व्यवस्था केली गेली. पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत होता यासाठी प्रांगणात छप्पर बांधण्यात आले. चहा-कॉफी, नाश्‍ता व जेवणाची व्यवस्था\nईरान मसले पर तनाव बढा\nत्रिविक्रमाची १८ वचने (मराठी)\nत्रिविक्रम के १८ वचन (हिन्दी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://puputupu.in/tag/marathi-suvichar/", "date_download": "2018-08-18T08:05:37Z", "digest": "sha1:4WBXGPAHPISQXPWEJFCA4QRKGQ773EQP", "length": 10176, "nlines": 163, "source_domain": "puputupu.in", "title": "Marathi Suvichar Archives - PupuTupu.in | PupuTupu.in", "raw_content": "\nमला आवडलेली काही वाक्ये;\n. .. वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. , आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं.. . ..\n. .. ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. , कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळलेय.. . .\n. .. “चांगली वस्तु”., “चांगली व्यक्ती”., “चांगले दिवस”.. , यांची किंमत “वेळ निघून गेल्यावर समजते”.. . ..\n. .. आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं.. . ..\n. .. जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल.. . ..\n. .. “चांगली वस्तु”., “चांगली माणसे”., “चांगले दिवस आले की माणसाने “जुने दिवस विसरू नयेत”.. . ..\n. .. पाणी धावतं., म्हणून त्याला मार्ग सापडतो.. . त्याप्रमाणे., जो प्रयत्न करतो त्याला यशाची., सुखाची., आनंदाची वाट सापडते.. . ..\n. .. नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल.. . ..\n. .. जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. , कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही.. . ..\n. .. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला “स्वभावाच” ठरवतो.. . ..\n. .. हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे.. . ..\n. .. तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात.. . ..\n. .. प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन.. . ..\n. .. जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., “समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम”.. . ..\n. .. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.. . ..\n. .. गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.. . ..\n. .. तुम्हाला जर मित्र हवे असतील, तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.. , चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.. . ..\n. .. केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.. . ..\n. .. तुम्ही कायम सदैव खुश राहा आणि आनंदात जगा.. . ..\n. .. जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला विचारा.. . ..\n. .. बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.. . ..\n. .. गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम.. . ..\n. .. वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते.. . ..\n. .. भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो., भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. , पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.. . ..\n. .. मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.. . ..\n. .. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.. . ..\n. .. ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो.. . ..\n. .. जखम करणारा विसरतो., पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.. . ..\n. .. आपण पक्षाप्रमाणे आकाशात\nउडायला शिकलो., माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो.. , पण जमिनीवर\nराहून माणसासारखे वागायला शिकलो का.. . ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/november-6/", "date_download": "2018-08-18T09:13:35Z", "digest": "sha1:D7FU2VULBSHF3STPWZ3PMARSSJK7SUJC", "length": 7023, "nlines": 153, "source_domain": "www.marathimati.net", "title": "६ नोव्हेंबर दिनविशेष | November 6", "raw_content": "\n१९५६ : युनेस्कोच्या नवव्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून मौलाना आझाद यांची निवड\n१९८७ : आफ्रिकन नेते गोवेन बेकची तुरुंगातून सुटका\n१९९९ : भारताचे ज्येष्ठ वैज्ञानिक एम. एस. स्वामिनाथन यांना ‘युनेस्को गांधी सुवर्णपदक’ जाहीर\n२००८ : प्रसिध्द काश्मिरी कवी रहमान राही यांना २००४ चा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले\n१८९३ : अमेरिकेतील मोटारगाडी उद्योजकाचे प्रवर्तक फोर्ड घराण्यातील एड्सेल फोर्ड\nमराठे शाहीतील प्रसिध्द राजकारणी स्त्री ताराबाई भोसले (ताराराणी भोसले)\n१९९२ : नाट्य गायक जयराम शिलेदार\nइ.स. पूर्व १९३१ : भिमाने आपल्या गदेच्या साहाय्याने दुर्योधनाचा वध करुन आपली प्रतिज्ञा पूर्ण केली\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in दिनविशेष and tagged एड्सेल फोर्ड, एम. एस. स्वामिनाथन, जन्म, जयराम शिलेदार, जागतिक दिवस, ठळक घटना, ताराबाई भोसले, दिनविशेष, मृत्यू, मौलाना आझाद, रहमान राही, ६ नोव्हेंबर on नोव्हेंबर 6, 2012 by संपादक.\n← ५ नोव्हेंबर दिनविशेष खारी शंकरपाळी →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-45068900", "date_download": "2018-08-18T09:42:01Z", "digest": "sha1:6VEENQWCHKJP6MHL22SYVAIK44DMCNRR", "length": 22095, "nlines": 144, "source_domain": "www.bbc.com", "title": "सांगली, जळगाव महापालिकांत भाजपने असा भेदला चक्रव्यूह - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nसांगली, जळगाव महापालिकांत भाजपने असा भेदला चक्रव्यूह\nश्रीकांत बंगाळे बीबीसी प्रतिनिधी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रस्थापित बालेकिल्ल्यांना तडा देत जळगाव आणि सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर या दोन्ही महापालिकांच्या निवडणुकीवर राज्याचे लक्ष लागून राहिले होते. पण या दोन्ही निवडणुकांतील वारे स्थानिक मुद्द्यांकडे वळवण्यात भाजपला यश आले.\nजळगाव महानगरपालिकेवर अनेक वर्षं शिवसेनेचे सुरेश जैन यांची एकहाती सत्ता होती. तर सांगली महापालिकेवर काँग्रेसची सत्ता होती. या निवडणुकांच्या तोंडावरच मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला. सांगलीमध्ये तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पूर्वनियोजीत दौरा दोन वेळा रद्द करावा लागला होता.\nपण दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाने पायाभूत सुविधा आणि स्थानिक मुद्द्यांवर भर देण्याचे डावपेच आखले आणि ते यशस्वीही करून दाखवले.\nजळगावमध्ये आरोग्यमंत्री गिरीश महाजन यश खेचून आणलं. इथं भाजपनं मुसंडी मारत एकहाती सत्ता काबीज केली. जळगाव महापालिका म्हणजे सुरेश जैन असा समीकरण या निवडणुकीने बदलले आहे.\nजळगाव, सांगली महापालिकेत भाजप स्वबळावर, निकालाचा अर्थ काय\nग्राउंड रिपोर्ट : मुख्यमंत्र्यांच्या सहीचं प्रमाणपत्र मिळालं, पण कर्जमाफी नाहीच\nमराठा आरक्षण कायद्याने शक्य आहे का\nतर गेली अनेक वर्षं सांगली म्हणजे काँग्रेसचा गड असं चित्र होतं. एकेकाळी काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबाचा प्रभाव असलेल्या सांगलीवर भाजपने झेंडा फडकवला आहे. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सांगलीत जनतेने नाकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनाही मोठा फटका बसला आहे.\nनागरिकांचा सत्ताधाऱ्यांविरोधात रोष - शेखर जोशी\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊनही त्यांना पराभव का पत्करावा लागला, यावर सकाळच्या सांगली आवृत्तीचे सहयोगी संपादक शेखर जोशी सांगतात, \"इतके दिवस सांगलीत काँग्रेसची सत्ता होती. पण काँग्रेसच्या काळात बेकायदेशीर कामांचे आरोप झाले. 150 ते 200 कोटी रुपयांची ड्रेनेज योजना आणण्यात आली. पण बिलं निघण्यापलीकडं काहीच झालं नाही. रस्ता, गटारी आणि इतर पायाभूत सुविधांच्या पातळीवर सांगली मागे पडली आहे. सांगलीत ना गुंतवणूक झाली ना उद्योग आले. त्यामुळे बरोजगारी वाढली. त्यामुळे स्थानिकांचा काँग्रेसवरील रोष वाढला आणि मतदानातून तो दिसून आला.\"\n\"दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेत विरोधी पक्ष होता. पण निवडणूक आली आणि या दोन पक्षांनी आघाडी केली. त्यामुळे लोकांमध्ये वेगळाच संदेश गेला आणि एकत्र लढूनही या पक्षांचा पराभव झाला,\" असं ते म्हणाले.\nमराठा आरक्षणाचा मुद्दा महापालिकेच्या निवडणुकीत दिसला का, यावर जोशी सांगतात, \"सांगलीतली निवडणूक ही पूर्णत: स्थानिक प्रश्नांवर लढली गेली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा फारसा कुणी विचार केला नाही. आरक्षण आणि महापालिकेचा काही संबंध नाही, आपण आरक्षणाचा विचार विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीवेळी करू असा विचार जनतेनं केलेला असू शकतो.\"\n\"सध्या तरी लोकांना आपल्याला चांगल्या सुविधा मिळाव्यात असाच विचार केला. काँग्रेसच्या कारभाराला कंटाळलेल्या जनतेला भाजपच्या रूपात चांगला पर्याय दिसला आणि त्यांनी भाजपला निवडून दिलं,\" असं ते म्हणाले.\n\"शिवाय वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबाचा सांगलीवरचा प्रभाव संपल्याचं दिसतं. वसंतदादा सहकारी बँक बुडीत निघाली तर वसंतदादा सहकारी साखर कारखाना चालवण्यासाठी भाडेतत्वावर द्यावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांचाही करिश्मा चालला नाही.\"\n\"राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या प्रचारचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीवर होता. तर भाजपनं मात्र स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं,\"असं ते म्हणाले.\nशिवसेनेने सांगली महापालिका स्वतंत्र लढवली, पण शिवसेनेला इथं प्रभाव दाखवता आला नाही.\nसांगली महापालिकेची निवडणूक एमआयएमनेही लढवली. पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काही जागा गमावण्यात एमआयएमचा थोडाफार हातभार लागला, असं जोशी म्हणाले.\nसांगलीकरांचं विकासाला प्राधान्य - आराधना श्रीवास्तव\n\"मराठा आरक्षणाविषयीचा रोष सांगली महापालिकेच्या निवडणुकीत दिसून येईल असं वाटत होतं, पण तसं काहीच झालं नाही. मराठा आरक्षणाचा विषय जनतेनं निवडणुकीपुरता बाजूला ठेवला असावा आणि विकासाला प्राधान्य दिलं असावं, असं दिसतं,\"अशी प्रतिक्रिया दैनिक पुढारीच्या पत्रकार आराधना श्रीवास्तव यांनी दिली.\n\"नागरी सुविधा मिळत नसतील तर आपण यांना निवडून कशासाठी दिलं, असा विचार लोकांच्या मनात येतो. सांगली महापालिकेत नेमकं हेच घडलं. शहराचा विकास व्हावा या हा मुद्द्यावर जनतेनं भाजपला निवडून दिलं,\" असं त्या म्हणाल्या.\n\"या निवडणुकीत मराठा समाजाने भाजपला मतं दिली. पण मराठा समाज आपल्या पाठीशी आहे, या भ्रमात भाजपने राहू नये. लोकांना बदल हवा होता आणि भाजपच्या रूपात त्यांना एक चांगला पर्याय मिळाला,\" असं त्या म्हणाल्या.\nजळगावमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा नव्हता - विजय राजहंस\n\"मराठा आरक्षणासाठी जळगावमध्ये आंदोलन झालं. पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाव दिसला नाही. खरं तर मराठा आरक्षणाचा मुद्दाच या निवडणुकीत अजेंड्यावर नव्हता,\" दिव्य मराठीचे चीफ रिपोर्टर विजय राजहंस जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल सांगतात.\n\"गेल्या 35 वर्षांपासून जळगाव महापालिका सुरेश जैन यांच्या ताब्यात होती. जळगावला शांघाय करू, असं स्वप्न त्यांनी दाखवलं. पण गेल्या 15 वर्षांपासून जळगावचा विकास ठप्प झालाय. शहरात कचऱ्याचा प्रश्न आ वासून उभा आहे, सांडपाण्याचा निचरा आणि घरकुलाचा विषय तर कित्येक दिवसांपासून प्रलंबित आहे. या सर्व परिस्थितीला स्थानिक जनता कंटाळली होती आणि त्यांना भाजपच्या रूपानं एक मजबूत पर्याय मिळाला,\" राजहंस सांगतात.\n\"शहराच्या विकासासाठी एका वर्षात 200 कोटी रुपये आणतो, असं आश्वासन गिरीश महाजन यांनी निवडणुकीत दिलं. स्थानिक जनतेला शहराचा विकास हवा आहे आणि जनतेच या आश्वासनावर लक्ष असेल,\" राजहंस म्हणाले.\nजळगावात महाजन यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब - युवराज परदेशी\n\"विधानसभा अथवा लोकसभा निवडणूक असती तर मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरला असता. पण जळगाव महापालिकेसाठी जनतेनं स्थानिक मुद्द्यांवर अधिक भर दिला. जैन यांची जळगाव महापालिकेवर 35 वर्षं सत्ता होती. त्यांच्या काळात घरकुल घोटाळा, विमानतळ घोटाळा आणि अटलांटा घोटाळा यामुळे जळगावचं नाव बदनाम झालं,\" असं लोकसत्ताचे जळगाव प्रतिनिधी युवराज परदेशी यांनी सांगितलं.\n\"गेल्या 2 वर्षांत तर जळगावचा विकास अक्षरश: खुंटला आहे. महापालिकेच्या धोरणांमुळे व्यापारी वर्गही जैन यांच्यापासून दुरावला आणि या सर्वांचा परिणाम त्यांची सत्ता जाण्यात झाला,\" असं ते म्हणाले.\nमराठा आरक्षणाच्या मुद्दा या निवडणुकीत आलाच नाही, असं ते म्हणाले.\n\"एकनाथ खडसे यांची स्वबळावर लढण्याची भूमिका होती. जैन यांच्याशी भाजपनं युती केल्यास आपण पक्षाविरोधात प्रचार करू असं त्यांनी म्हटलं होतं. असं असलं तरी निवडणूक गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालीच लढवली गेली आणि भाजपच्या विजयानं महाजन यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालं,\" खडसे यांच्या नाराजीचा भाजपला फटका बसला का, यावर परदेशी सांगतात.\nमराठा आरक्षण कायद्याने शक्य आहे का\nग्राउंड रिपोर्ट : 'मराठा आरक्षणासाठी भाऊ गमावलाय, आता स्वस्थ बसणार नाही'\nमराठा आंदोलनासाठी जीव देणारे काकासाहेब शिंदे कोण आहेत\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nकेरळ पूर : पंतप्रधानांनी केली 500 कोटींच्या पॅकेजची घोषणा\nदृष्टिकोन : 'हिंदू हृदयसम्राट' मोदींसाठी वाजपेयींनी असा आखला मार्ग\nपैशाची गोष्ट : भारत-पाक व्यापारी संबंधात ही आहेत आव्हानं\nइंडोनेशिया एशियन गेम्स : बंदोबस्तासाठी 77 जणांना ठार केलं\nअटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांचं नातं कसं होतं\nइम्रान खान यांनी घेतली पाकिस्तानचे 22वे पंतप्रधान म्हणून शपथ\nजेव्हा त्यांच्या धोतराला अमेरिकन महिला म्हणाली 'सेक्सी ट्राउझर'\nगोवारी म्हणजे स्वतंत्र आदिवासी जमात : 24 वर्षांच्या संघर्षाचा विजय\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://dateycollege.in/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-18T08:15:48Z", "digest": "sha1:PIGZOKOMFMPTWGLCDVL74QKZLZOE6KIH", "length": 6113, "nlines": 50, "source_domain": "dateycollege.in", "title": "अंतराळातील ग्रहांविषयी सजग व्हा - बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ", "raw_content": "बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ\n(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित )\nअंतराळातील ग्रहांविषयी सजग व्हा\nअंतराळातील ग्रहांविषयी सजग व्हा\nबाबाजी दाते महाविद्यालयातील भूगोल अभ्यासमंडळाच्या उद्घाटन प्रसंगी खगोलशास्त्र अभ्यासकांचे आवाहन ‘सूर्यमालेतील शनी व मंगळा सारखे ग्रह पृथ्वी पासून लक्षावधी की.मी. अंतरावर आहेत. आपल्या आयुष्यातील छोट्या मोठ्या घटनांवर त्यांचे अनिष्ट परिणाम होत नसतात’, हे वैज्ञानिक सत्य खागोलोशास्त्राचे अभ्यासक श्री रवींद्र खराबे यांनी व्यक्त केले. श्री खराबे बाबाजी दाते कला आणी वाणिज्य महाविद्यालयाच्या भूगोल अभ्यास मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. चंद्र आणि सूर्याची ग्रहणे हा सावल्यांचा खेळ असून तो पृथ्वी आणी चंद्राच्या परिभ्रमणामुळे होतो. ग्रहणाबद्दल लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी भूगोलाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी बाबाजी दाते महाविद्यालयातील भूगोल अभ्यास मंडळाने सूर्यमालेची अभ्यासपूर्ण माहिती देणारा स्लाईड शो आयोजित केला होता.\nया कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना भूगोल विभागप्रमुख प्रा डॉ. कल्पना देशमुख यांनी ‘भूगोल हा केवळ चार भिंतींमध्ये शिकविण्याचा विषय नसून त्याची व्याप्ती आणी आवाका मोठा आहे’ असे मत व्यक्त केले. त्यांनी भूगोल विभागाद्वारे वर्षभरात आयोजित केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी भूगोल अभ्यास मंडळाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. अभ्यास मंडळाचे अध्यक्षपदी राहुल सातपुते, उपाध्यक्षपदी शिवम पद्म्मावार, सचिव सायली मानतूटे आणी १२ सदस्यांची निवड करण्यात आली.\nया कार्यक्रमाचे उद्घाटक वाणिज्य न्यासचे उपाध्यक्ष श्री सतीश फाटक होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रेरणा पुराणिक यांनी भूषवले तर प्रमुख अतिथी उपप्राचार्य प्रा. डॉ.माणिक मेहरे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी प्रा. यशवंत राठोड, प्रा.चित्रा राउत, प्रा.शैलजा वैद्य व अभ्यास मंडळाचे पदाधिकारी यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाला भूगोल विषयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनिंनी मोठ्या संखेने उपस्थित राहून उस्फुर्त प्रतिसाद दिला.\nCopyright © 2018 बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/chief-minister-clean-chit-nawab-malik-politics-124568", "date_download": "2018-08-18T08:45:55Z", "digest": "sha1:TKQXY2TS7YY4X7GBO3PQB3DZDGBS63GG", "length": 12158, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "chief minister clean chit nawab malik politics मुख्यमंत्र्यांनी \"क्‍लीन चिट' देण्याचा धंदा बंद करावा - नवाब मलिक | eSakal", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांनी \"क्‍लीन चिट' देण्याचा धंदा बंद करावा - नवाब मलिक\nमंगळवार, 19 जून 2018\nऔरंगाबाद - राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. असे असताना एकीकडे \"वाळूमाफियांचे ट्रक सोडा', असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातून फोन केले जातात. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोषींना \"क्‍लीन चिट' देऊन मोकळे होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी हे धंदे बंद करावेत, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी येथे पत्रकार परिषदेत लगावला.\nजळगाव जिल्ह्यातील वाकडी येथील मातंग समाजाच्या मुलांना मारहाणप्रकरणी सोमवारी भेट दिल्यानंतर मलिक येथील राष्ट्रवादी भवनमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की हे प्रकरण दाबण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी पीडित कुटुंबावर दबाव आणला. \"केस मागे घे; अन्यथा तुझ्यावरच चोरीचे गुन्हे दाखल करू', अशी धमकी महाजन यांची माणसे देत होती. विशेष म्हणजे तक्रारदारांचे अपहरणही करण्यात आले होते. मुळात गंभीर घटना असतानाही पीडितांनाच धमक्‍या देणे, हे अधिक गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, मंत्री महाजन यांचे कॉल रेकॉर्ड तपासावे, अशी मागणीही त्यांनी केली. दोषींवर कारवाई झाली नाही, तर आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला.\nराज्यात वाळूसह अन्य माफियांचे फावत आहे. वाळूचे ट्रक सोडण्यासाठी महसूलमंत्री पाटील यांच्या कार्यालयातूनच फोन केले जात आहेत. जळगावात ड्रग्जमाफियाकडून संरक्षणासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दहा लाख रुपये घेतले. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथील भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी गुटखामाफियांना सोडा म्हणत पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोपही मलिक यांनी या वेळी केला.\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून सहाजण जखमी\nबेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने बंगळूरकडे जाणारी व्हीआरएलची आराम बस उलटून चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय...\nसमस्या सोडवण्यासाठी नाशिकला भरणार शिक्षकांचा दरबार\nयेवला - शिक्षकांच्या विविध रखडलेल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी नाशिकमध्ये विभागातील शिक्षकांचा शिक्षक दरबार गुरुवारी (ता.२३) आयोजित करण्यात आला...\nसैनिकांमुळे आपण सुरक्षित : आमदार औटी\nटाकळी ढोकेश्वर : दिवसरात्र देशाच्या सेवेसाठी व आपल्या संरक्षणासाठी सिमेवर सैनिक दिवसरात्र उभा असतो म्हणुन आपण सुरक्षित वावरत आहोत त्यांचे उपकार...\nथ्री डी कोलाजमधून साकारले शिवचरित्र\nइचलकरंजी - जिद्द आणि चिकाटी ठेवत तब्बल ७ वर्षे परिश्रम घेत, येथील डॉ. ज्योती दशावतार बडे यांनी थ्री डी कोलाजमधून अवघे शिवचरित्र साकारले आहे. हा...\nपावसमध्येही होमिओपॅथिक हॉस्पिटल उभारू - राऊत\nरत्नागिरी - हार-तुऱ्यांसाठी आमची पदे नाहीत. जनसेवेची आमची भूमिका आहे. १०० टक्के समाजकार्य करून तुमचे आशीर्वाद मिळविण्यातच आम्हाला धन्यता मिळते....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/10-committee-goes-ncp-32138", "date_download": "2018-08-18T08:39:08Z", "digest": "sha1:37MGZIWT327ITP73PITKJCU6G5DRPCBF", "length": 13184, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "10 committee goes to ncp राष्ट्रवादीचा दहा समित्यांवरही झेंडा | eSakal", "raw_content": "\nराष्ट्रवादीचा दहा समित्यांवरही झेंडा\nशुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017\nआठ समित्यांवर स्पष्ट बहुमत; दोन ठिकाणी संधी, कऱ्हाडला उंडाळकर 'किंगमेकर'\nआठ समित्यांवर स्पष्ट बहुमत; दोन ठिकाणी संधी, कऱ्हाडला उंडाळकर 'किंगमेकर'\nसातारा - सातारा जिल्हा आपलाच बालेकिल्ला असल्याचे सिद्ध करणाऱ्या राष्ट्रवादीने जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांवर एकहाती सत्ता राखली, तर दोन पंचायत समित्यांत सर्वाधिक निम्म्या जागा मिळवून तेथेही सत्तेचे दावेदार आपणच असल्याचे राष्ट्रवादीने दाखवून दिले. कऱ्हाडला राष्ट्रवादीने सात जागा मिळविल्या असल्या, तरी माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांनीही सात जागा जिंकल्याने जिकडे ते तिकडे सत्ता, अशी त्रिशंकू स्थिती आहे.\nजिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांतील 128 जागांवर झालेल्या लढतीत राष्ट्रवादीने तब्बल 76 जागांवर विजयश्री मिळविली. कॉंग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना हे राष्ट्रवादीच्या जवळपासही पोचू शकले नाहीत. ते अनुक्रमे 15, 23, सहा जागांपुरते अल्पसंतुष्ट ठरले. गेल्या वेळी कोरेगाव, माण, पाटणमध्ये राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे सदस्य समान विजयी झाल्याने चिठ्ठीचा खेळ रंगला होता. यंदा मात्र राष्ट्रवादीने हा खेळ ठेवलाच नाही. सातारा, फलटण, कोरेगाव, महाबळेश्‍वर, जावळी, खटाव, वाई, पाटणमध्ये एकहाती सत्ता मिळविली. खंडाळा पंचायत समितीत सर्वाधिक तीन, तर माण समितीत सर्वाधिक पाच जागा मिळविल्याने तेथेही सत्तेचे दावेदार राष्ट्रवादीच ठरला आहे.\nकऱ्हाड पंचायत समितीत मात्र उंडाळकर गटाच्या कऱ्हाड तालुका विकास आघाडीने बाजी मारल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. उंडाळकर गट व राष्ट्रवादीने प्रत्येकी सात जागा मिळविल्या. भाजपने सहा, तर कॉंग्रेसला अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले. यापूर्वी आमदार बाळासाहेब पाटील यांचे नऊ, उंडाळकरांचे सात, पृथ्वीराज चव्हाण गटाचे पाच, तर अतुल भोसले गटाचे दोन सदस्य होते. त्यामुळे बाळासाहेब व उंडाळकर एकत्रित येत राष्ट्रवादीने सभापतिपद राखले होते. यंदा मात्र, उंडाळकर हे अतुल भोसलेंबरोबर राहण्याची दाट शक्‍यता असल्याने तेच सत्तेचे सूत्रधार ठरणार आहेत. माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी दोन जागा जास्त मिळवत पाटणची सत्ता राष्ट्रवादीला मिळवून दिली.\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nऔरंगाबाद : 'एमआयएम'च्या नगरसेवकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा\nऔरंगाबाद : महापालिकेत एमआयएम नगरसेकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या पाच नगरसेवकांविरोधात शुक्रवारी (ता.17) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयएम नगरसेवक...\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून सहाजण जखमी\nबेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने बंगळूरकडे जाणारी व्हीआरएलची आराम बस उलटून चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय...\nपिंपळवंडीला मानव-बिबट सहजीवन जनजागृती\nजुन्नर - पिंपळवंडी ता.जुन्नर येथे मानव व बिबट संघर्ष व सहजीवन याविषयी मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती करण्यात आली. जुन्नर वन विभाग तसेच...\nरावेतला स्वतंत्र पोलिस चौकीची मागणी\nवाल्हेकरवाडी - रावेत परिसराचा विकास झपाट्याने वाढत आहे, त्याचप्रमाणे गुन्हेगारीही वाढत आहे. रावेत परिसरात गुन्हा घडला अथवा काही कारणास्तव पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/if-you-do-not-get-reservation-next-one-year-then-resignation-says-subhash", "date_download": "2018-08-18T08:59:35Z", "digest": "sha1:6QX3KC5ZH3FSKQ3BJF7SXRS224PKEGVM", "length": 11915, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "If you do not get reservation for next one year then resignation says subhash deshmukh पुढील आषाढीपर्यंत आरक्षण न मिळाल्यास राजीनामा - सुभाष देशमुख | eSakal", "raw_content": "\nपुढील आषाढीपर्यंत आरक्षण न मिळाल्यास राजीनामा - सुभाष देशमुख\nसोमवार, 23 जुलै 2018\nसोलापूर - पुढील वर्षी होणाऱ्या आषाढी एकादशीपूर्वी जर मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही; तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, अशी भूमिका सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी घेतली आहे. राज्यभर मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी ही भूमिका घेतली. त्याचबरोबर आंदोलकांनी शांतता राखण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.\nसोलापूर - पुढील वर्षी होणाऱ्या आषाढी एकादशीपूर्वी जर मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही; तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, अशी भूमिका सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी घेतली आहे. राज्यभर मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी ही भूमिका घेतली. त्याचबरोबर आंदोलकांनी शांतता राखण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.\nआज सहकारमंत्री देशमुख पंढरपूरला जात असताना माचणूर (ता. मंगळवेढा) येथे त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात काय-काय करत आहे, त्याची सर्व माहिती त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिली. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आंदोलनकर्त्यांचे दूरध्वनीद्वारे बोलणे करून दिले. सर्व मराठा समाजाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याची ग्वाहीही या वेळी सहकारमंत्री देशमुख यांनी दिली. आषाढीच्या पार्श्‍वभूमीवर आंदोलकांनी शांतता राखण्याचे आवाहन सहकारमंत्र्यांनी केले.\nभाषणात मोठी ताकद आहे.. : बबन साळगांवकर\nसावंतवाडी : भाषणात मोठी ताकद आहे त्याच वक्तृत्वाचा फायदा घेऊन तब्बल 23 दिवसांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे पहिल्यांदा आमदार बनले आणि त्यांनी नंतर...\nपंतप्रधानांकडून केरळसाठी 500 कोटींची मदत जाहीर\nतिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल...\nताडगाव - मोफत आरोग्य शिबिरात गरिब व आदिवासी नागरीकांनी घेतला लाभ\nपाली - सुधागड तालुक्यातील ताडगाव येथे गुड डुअर्स चैरिटीज मुंबई, टिकेडिके परिसर विकास संघर्ष समिती आणि जय भैरवनाथ युवा मित्र मंडळ ताडगांव यांच्या...\nपंतप्रधान मोदी केरळमध्ये दाखल ; पुरपरिस्थितीचा आढावा घेणार\nतिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरात आत्तापर्यंत 300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर कोट्यवधींचे...\nपावसमध्येही होमिओपॅथिक हॉस्पिटल उभारू - राऊत\nरत्नागिरी - हार-तुऱ्यांसाठी आमची पदे नाहीत. जनसेवेची आमची भूमिका आहे. १०० टक्के समाजकार्य करून तुमचे आशीर्वाद मिळविण्यातच आम्हाला धन्यता मिळते....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/leopard-enters-house-dhebewadi-satara-134682", "date_download": "2018-08-18T08:45:30Z", "digest": "sha1:PNGGKZWPPWQOOG2GAE2ZWIWPW5TGQ5FD", "length": 13260, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "leopard enters in house in dhebewadi satara कुत्र्याचा माग काढत बिबट्या थेट घरात! | eSakal", "raw_content": "\nकुत्र्याचा माग काढत बिबट्या थेट घरात\nमंगळवार, 31 जुलै 2018\nढेबेवाडी (सातारा) : कुत्र्याचा माग काढत बिबट्या घरात घुसल्याची घटना वरचेघोटील (ता. पाटण) येथे काल रात्री साडेअकराच्या सुमारास घ़डली. कुत्र्याच्या आवाजामुळे जाग आलेल्या घरातील लोकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या तेथून पळून गेला मात्र जाताना त्याने जवळच्याच दुसऱया वस्तीतील घराजवळून एक कुत्रे पळवून नेले. जंगलालगतच्या शिवारात दृष्टीला प़डणारा बिबट्या आता घरात घुसू लागल्याने त्या परिसरात घबराटीचे वातावरण आहे.\nढेबेवाडी (सातारा) : कुत्र्याचा माग काढत बिबट्या घरात घुसल्याची घटना वरचेघोटील (ता. पाटण) येथे काल रात्री साडेअकराच्या सुमारास घ़डली. कुत्र्याच्या आवाजामुळे जाग आलेल्या घरातील लोकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या तेथून पळून गेला मात्र जाताना त्याने जवळच्याच दुसऱया वस्तीतील घराजवळून एक कुत्रे पळवून नेले. जंगलालगतच्या शिवारात दृष्टीला प़डणारा बिबट्या आता घरात घुसू लागल्याने त्या परिसरात घबराटीचे वातावरण आहे.\nघोटीलचे युवराज पाटील व ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगरमाथ्यावर जंगलाच्या कुशीत वसलेल्या वरचेघोटील येथे बिबट्यांसह अन्य प्राण्यांचा सतत उपद्रव जाणवतो. आतापर्यंत तेथील अनेक पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ले करून त्यांना फस्त केले आहे. त्याशिवाय रानडुक्करे आणि गव्यांच्या कळपांचाही शेतातील उभ्या पिकांमध्ये सतत धुमाकूळ सुरू असल्याने तेथील शेती अडचणीत आली आहे. काल रात्री तेथील बौध्दवस्तीत साडेअकराच्या सुमारास कुत्र्याचा माग काढत बिबट्या आला. किसन संतू कांबळे यांच्या घरात बांधलेल्या कुत्र्याचा त्याला सुगावा लागल्यानंतर घराची ताटी तोडून त्याने आत प्रवेश करून कुत्र्यावर झडप घातली. यावेळी झालेल्या आवाजाने कांबळे कुटूंबियांना जाग आल्याने त्यांनी घाबरून आरडाओरडा केल्यावर बिबट्या तेथून पळून गेला. मात्र जाताना त्याने जवळच्याच दत्तवस्तीकडे मोर्चा वळवून तेथील श्रीमती खासाबाई पवार यांच्या घराजवळ बांधलेल्या कुत्र्यावर झडप टाकून कुत्रे फरफटत नेले.\nपहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. घराबाहेर आलेल्या एकाने हा प्रकार पाहिल्यावर आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत बिबट्या कुत्रे घेवून पसार झाला होता. या घटनेमुळे ग्रामस्थांत घबराटीचे वातावरण आहे. जंगलालगतच्या शिवारात दृष्टीला पडणारा बिबट्या आता घरात घुसू लागल्याने त्या परिसरात घबराटीचे वातावरण आहे. लोक डोंगरात जनावरे चरायला नेण्यास आणि शेतात जाण्यासही घाबरत आहेत.\nपिंपळवंडीला मानव-बिबट सहजीवन जनजागृती\nजुन्नर - पिंपळवंडी ता.जुन्नर येथे मानव व बिबट संघर्ष व सहजीवन याविषयी मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती करण्यात आली. जुन्नर वन विभाग तसेच...\nटाकळी हाजी - बिबट्यामुळे मानव वस्तीत कोल्हे कुई\nटाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात बिबट्याने चांगलाच उच्छाद मांडला आहे. पाळीव प्राण्यांवर होणारे दररोजचे हल्ल्याच्या घटना घडतच आहेत. त्यात...\nमुलांच्या बिछान्यात बिबट्याचे पिलू...\nइगतपुरी - तालुक्‍यातील धामणगावमध्ये एका कुटुंबात आज एक नवा \"पाहुणा' बालगोपाळांसोबत चक्क मच्छरदाणीत...\nबिबट्याच्या हल्ल्यात घोडा ठार\nटाकळी हाजी - आमदाबाद (ता. शिरूर) येथे बिबट्याने हल्ला केल्याने अडीच वर्षांचा घोडा जागीच ठार झाला. दररोज...\nसावधान... परिसरात बिबट्या आहे\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : आठवड्यापूर्वी मेहुणबारे शिवारात आढळलेला बिबट्याने काल(ता.12) वडगाव लांबे(ता चाळीसगाव) येथे कुत्र्याला फस्त केले तसेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nashik-road-court-133678", "date_download": "2018-08-18T08:46:21Z", "digest": "sha1:SMGPJSUEP2AWTPT2625IIIK7TBUNUMJK", "length": 12483, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news nashik road court नाशिक रोड न्यायालय इमारतीचा शनिवारी कोनशीला | eSakal", "raw_content": "\nनाशिक रोड न्यायालय इमारतीचा शनिवारी कोनशीला\nगुरुवार, 26 जुलै 2018\nनाशिकः नाशिक रोड येथील फौजदारी व दिवाणी न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशीला अनावरण येत्या शनिवारी (ता.28) मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय रणजीत मोरे यांच्या हस्ते सकाळी अकराला होणार आहे. प्रमुख पाहूणे म्हणून पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी\nनाशिकचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश सुर्यकांत शिंदे असतील.\nनाशिकः नाशिक रोड येथील फौजदारी व दिवाणी न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशीला अनावरण येत्या शनिवारी (ता.28) मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय रणजीत मोरे यांच्या हस्ते सकाळी अकराला होणार आहे. प्रमुख पाहूणे म्हणून पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी\nनाशिकचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश सुर्यकांत शिंदे असतील.\nनाशिक रोड पोलिस ठाण्यालगत पूर्वीच्या डिस्ट्रीलरी क्वाटर्स परिसरात 3 एकर जागेवर न्यायालयाची नवीन इमारत होणार आहे. इमारतीसाठी साडे 12 कोटीचा निधीला मंजूरी मिळाली आहे. इमारतीच्या बांधकाम निविदा निघून प्रत्यक्ष कामकाज सुरु झाले आहे. पहिल्या टप्प्यात 2 मजल्यांच्या इमारतीला मान्यता असून भविष्यात न्यायालयाच्या गरजेनुसार 4 मजल्यापर्यत विस्ताराची बांधकाम आराखड्यात तजवीज ठेवली आहे. इमारतीत पार्कींग, वकील कक्ष, बेलीफ कक्ष, सरकारी वकीलांचा कक्षासह अद्यावत\nसुविधा असतील. दिड वर्षात इमारत पूर्णत्वास येईल. असा अंदाज आहे.\n9 वर्षापासून नाशिक रोड वकील संघाचा पाठपुरावा सुरु होता. माजी मंत्री अजित पवार, दत्ता गायकवाड, पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार बाळासाहेब सानप यांच्यापासून तर बार असोसिएशनच्या सदस्यापर्यत सगळ्याच्या प्रयत्नामुळे हे शक्‍य झाले.\n-ऍड सुदाम गायकवाड (अध्यक्ष ना.रोड वकील संघ)\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nबारामती - विद्या प्रतिष्ठानच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पुरस्कार\nबारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून सहाजण जखमी\nबेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने बंगळूरकडे जाणारी व्हीआरएलची आराम बस उलटून चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय...\nउंड्री - पाचव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजूर ठार\nउंड्री - गुलाम अली नगर गल्ली नं 6 दि.13 ऑगस्ट दु.12.30 वाजता एका निर्माणाधीन इमारतीचे काम सुरू असताना पाचव्या मजल्यावर पडून राजशेखर माशाले (वय 33...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune-wari/sant-tukaram-maharaj-palkhi-pimpri-news-53623", "date_download": "2018-08-18T08:26:57Z", "digest": "sha1:OHWHFXKFE5RYANCFYJD63M6XAQOCCO5Q", "length": 13031, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "sant tukaram maharaj palkhi pimpri news तुकोबांच्या सोहळ्याला पिंपरीमधून निरोप | eSakal", "raw_content": "\nतुकोबांच्या सोहळ्याला पिंपरीमधून निरोप\nसोमवार, 19 जून 2017\nपिंपरी - मुखाने विठू नामाचा अखंड गजर आणि भगव्या पताका खांद्यावर घेऊन वैष्णवांचा मेळा संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासमवेत भक्तिमय वातावरणात रविवारी पहाटे पुण्याकडे मार्गस्थ झाला. श्री संत गवरशेठ लिंगायत वाणी पालखी आणि श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पालख्यांनाही पिंपरी-चिंचवडकरांनी निरोप दिला. दापोडीत विसावा घेऊन तुकोबांची पालखी दुपारी दीडच्या सुमारास पुण्याकडे मार्गस्थ झाली.\nपिंपरी - मुखाने विठू नामाचा अखंड गजर आणि भगव्या पताका खांद्यावर घेऊन वैष्णवांचा मेळा संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासमवेत भक्तिमय वातावरणात रविवारी पहाटे पुण्याकडे मार्गस्थ झाला. श्री संत गवरशेठ लिंगायत वाणी पालखी आणि श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पालख्यांनाही पिंपरी-चिंचवडकरांनी निरोप दिला. दापोडीत विसावा घेऊन तुकोबांची पालखी दुपारी दीडच्या सुमारास पुण्याकडे मार्गस्थ झाली.\nआकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात शनिवारी रात्री पालखीचा मुक्काम होता. तेथे दर्शनासाठी भाविकांची लांब रांग लागली होती. दिगंबर कुटे यांच्या हस्ते समाजआरती झाली. नगरसेविका वैशाली काळभोर व मीनल यादव, संदीप कुटे, गोपाळ कुटे, गुलाब कुटे उपस्थित होते. भाविकांना महाप्रसाद वाटप केला. रात्री देशमुख महाराजांचे कीर्तन झाले. पुंडलिक महाराज मोरे यांच्या उपस्थित शेजारती झाली. त्यानंतर जागर झाला. रविवारी पहाटे काकड आरती व महापूजा झाली. त्यानंतर सोहळा पुणे-मुंबई महामार्गाने खंडोबा माळ चौक, चिंचवड स्टेशन, पिंपरी, खराळवाडी, कासारवाडी, फुगेवाडी मार्गे पुण्याकडे मार्गस्थ झाला. ठिकठिकाणी पालखीचे मनोभावे आणि उत्साहात स्वागत झाले. दर्शनासाठी भाविकांनी दुतर्फा गर्दी केली. मुंबई पुणे महामार्गाची डाव्या बाजू वाहतुकीसाठी बंद केली होता. ग्रेड सेपरेटर व उजव्या बाजूची वाहतूक फुगेवाडीतून वळविली होती.\nखराळवाडीतील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात सकाळी साडेसातच्या सुमारास पालखीचा पहिला विसावा झाला. वारकऱ्यांनी न्याहारी केली. पालखी व विठ्ठल-रुक्‍मिणी मूर्तीची पूजा झाली. भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सकाळी नऊच्या सुमारास पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली.\nसंत तुकाराम महाराज पालखी\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून सहाजण जखमी\nबेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने बंगळूरकडे जाणारी व्हीआरएलची आराम बस उलटून चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय...\nपिंपळवंडीला मानव-बिबट सहजीवन जनजागृती\nजुन्नर - पिंपळवंडी ता.जुन्नर येथे मानव व बिबट संघर्ष व सहजीवन याविषयी मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती करण्यात आली. जुन्नर वन विभाग तसेच...\nरावेतला स्वतंत्र पोलिस चौकीची मागणी\nवाल्हेकरवाडी - रावेत परिसराचा विकास झपाट्याने वाढत आहे, त्याचप्रमाणे गुन्हेगारीही वाढत आहे. रावेत परिसरात गुन्हा घडला अथवा काही कारणास्तव पोलिस...\nचिंचवडमध्ये रविवारी रंगणार महिला प्रेरणा संमेलन\nवाल्हेकरवाडी - स्वयंसिद्धा प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड शहर) आणि प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि. 19 ऑगस्ट) चिंचवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/pune-edition-article-vehicle-industry-nammudra-124305", "date_download": "2018-08-18T09:03:59Z", "digest": "sha1:U6I5BKH5JKHJ6NZR6EGSUTKNZX3I7IHW", "length": 14521, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune Edition Article on Vehicle Industry Nammudra वाहन उद्योगातील \"अर्थ'रागिणी (नाममुद्रा ) | eSakal", "raw_content": "\nवाहन उद्योगातील \"अर्थ'रागिणी (नाममुद्रा )\nसोमवार, 18 जून 2018\nकंपनीत आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या विविध पदांच्या जबाबदाऱ्या त्यांनी सहजतेने पेलल्या. त्यांनी 2013 मध्ये जनरल मोटर्स ऍसेट मॅनेजमेंटच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून निवृत्तिवेतनाशी संबंधित 85 अब्ज डॉलरची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.\nआपल्या क्षमतेच्या बळावर अनेक भारतीय महिला जगभरात विविध क्षेत्रांत कौतुकास्पद भरारी घेत आहेत. वाहन उद्योगासारख्या पुरुषी समजल्या जाणाऱ्या क्षेत्रातही स्त्रीशक्तीने कर्तृत्वाचा झेंडा उभारला आहे. अमेरिकेतील \"जनरल मोटर्स' या सर्वांत मोठ्या वाहननिर्मिती कंपनीच्या मुख्य वित्त अधिकारीपदी (सीएफओ) दिव्या सूर्यदेवरा या भारतीय-अमेरिकी महिलेची नुकतीच नियुक्ती झाली आहे.\nवाहननिर्मिती कंपन्यांच्या 110 वर्षांच्या इतिहासात \"सीएफओ'पद भूषविणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. विशेष म्हणजे, कंपनीचे \"सीईओ'पदही मेरी बारा यांच्या निमित्ताने एका महिलेकडेच आले आहे. त्यामुळे, \"जनरल मोटर्स'मध्ये या दोन्ही उच्च पदांवर कर्तृत्ववान महिला विराजमान होण्याचा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे.\nचेन्नईमध्ये जन्मलेल्या 39 वर्षीय सूर्यदेवरा यांनी मद्रास विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी मिळविली. त्यानंतर, वयाच्या 22 व्या वर्षी अमेरिकेतील हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून त्यांनी \"एमबीए' केले. जागतिक बॅंकेतील इंटर्नशिपमुळे त्यांना अनुभवाची चांगली संधी मिळाली. \"यूबीएस' आणि \"प्राईसवॉटरहाऊस कूपर्स'सारख्या कंपन्यांमध्ये वित्तीय विश्‍लेषक आणि लेखापाल म्हणून त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्या सध्या \"जनरल मोटर्स'मध्ये कार्पोरेट फायनान्सच्या उपाध्यक्ष आहेत.\nकंपनीत आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या विविध पदांच्या जबाबदाऱ्या त्यांनी सहजतेने पेलल्या. त्यांनी 2013 मध्ये जनरल मोटर्स ऍसेट मॅनेजमेंटच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून निवृत्तिवेतनाशी संबंधित 85 अब्ज डॉलरची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्याचप्रमाणे, \"जनरल मोटर्स'ला \"फॉर्च्युन 500' कंपन्यांच्या यादीत स्थान मिळवून दिले. \"सीईओ' आणि \"सीएफओ' या दोन्ही पदांवर महिला असणारी \"जनरल मोटर्स' ही या यादीतील दुसरी कंपनी आहे.\nस्वत: सूर्यदेवरा यांनी \"फॉर्च्युन' मासिकाच्या चाळीस वर्षांखालील कर्तृत्ववान व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवले आहे. खरेतर, सूर्यदेवरा यांनी वाहन उद्योगात जाण्याचे ठरविले नव्हते. मात्र, आव्हानात्मक आणि गुंतागुंतीच्या कामातच आनंद मानण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी एवढी मोठी मजल मारली आहे. वडिलांच्या अकस्मात निधनानंतर, त्यांच्या आईने वडिलांचीही भूमिका निभावून त्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यामुळेच, पितृदिनानिमित्त त्यांनी आपल्या पालकांना \"सीएफओ'पदाची भेट दिली आहे. दिव्या सूर्यदेवरा यांची वाटचाल सर्वच महिलांना कारकिर्दीतील उत्तुंगतेची शिखरे पादाक्रांत करण्याची प्रेरणा देईल, यात शंका नाही.\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nसंग्रामपूर : वाण धरण ६५ टक्के भरले\nसंग्रामपूर : सातपुडा पर्वतामधील तीन जिल्ह्यांसाठी जलसंजीवनी ठरलेले वाण धरण 65 टक्के भरले आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या ...\nचिंचवडमध्ये रविवारी रंगणार महिला प्रेरणा संमेलन\nवाल्हेकरवाडी - स्वयंसिद्धा प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड शहर) आणि प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि. 19 ऑगस्ट) चिंचवड...\nघरकामगार, बांधकाम मजूर महिलांची उपेक्षाच\nजळगाव : दिवसरात्र काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, पण डोक्‍यावर हक्काचं छत नाही...सतत कष्ट करूनही पदरी काहीच न पडल्यामुळे अनेकदा उपवास...\nगिरणा धरण झाले 31 टक्के\nचाळीसगाव : हरणबारी धरणापाठोपाठ गुरुवारी (16 ऑगस्ट) केळझर धरण \"ओव्हर फ्लो' झाले. चणकापूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे त्यातूनही मोठ्या प्रमाणावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5.php", "date_download": "2018-08-18T09:05:06Z", "digest": "sha1:JJZ4K4VIQ6GNVRGQTJHC5OQSBKIG7UJ4", "length": 78553, "nlines": 1222, "source_domain": "tarunbharat.org", "title": "मुख्यमंत्र्यांवर विश्‍वास! | Tarun Bharat", "raw_content": "\nवीर संघवी, ज्येष्ठ पत्रकार\nउजव्या विचारसरणीला एक मंच उपलब्ध होईल म्हणून पुद्दुचेरी साहित्य उत्सव रद्द करण्याची डाव्यांची मागणी विचित्र...\nप्रशांत उमराव, वकील, सर्वोच्च न्यायालय\nमेरठमध्ये हेलिकॉप्टरमधून शिवभक्त कावडियांवर फुलांचा वर्षाव करणारे मेरठ भागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांना...\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळात एकाच दिवशी शंभर बळी\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nआयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ\nअजित वाडेकर यांचे निधन\nकेरळमध्ये पावसाचे ७७ बळी; १८ हजार बेघर\nवीर संघवी, ज्येष्ठ पत्रकार\nAll अर्थ कृषी नागरी न्यायालय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nआयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ\nअजित वाडेकर यांचे निधन\nसीआरपीएफला सर्वाधिक शौर्य पदके\nमहाराष्ट्राला ५१ पोलिस पदके\nहवाई दल जवानाच्या वेषात अतिरेकी\nराजीव गांधींनीच नाकारला होता दलितांचा हक्क\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nरस्ता सुरक्षा विषय अभ्यासक्रमात असावा\nडिजिटल व्यवहारांवर २० टक्के कॅशबॅक\nघर, वाहनकर्ज महागले; व्याजदरात ०.२५ टक्क्यांची वाढ\nमहसूल वाढल्याने जीएसटी घटणार\nनिर्देशांक नव्या विक्रमी उच्चांकावर\n‘डिमांड ड्राफ्ट’च्या नियमात बदल\nडॉलरसमोर रुपया सक्षम, मोदी सरकार धैर्यवान\nदेशभर आज जीएसटी दिवस पाळणार\nआर्थिक सल्लागार भारतीय मूल्ये जोपासणारा असावा\nसरकारी बँकांमध्ये लोकांचा पैसा सुरक्षित\nनागरिकांना प्रामाणिकपणे कर भरण्याची विनंती\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nविदर्भ, मराठवाड्यातील आठ सिंचन प्रकल्पांना केंद्राची मदत\nयंदा ९७ टक्के पाऊस\nहमीभावात दीडपट वाढ होणारच\nशेतीपर्यंत पाणी नेण्याची गरज : नितीन गडकरी\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nआयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ\nअजित वाडेकर यांचे निधन\nसीआरपीएफला सर्वाधिक शौर्य पदके\nमहाराष्ट्राला ५१ पोलिस पदके\nहवाई दल जवानाच्या वेषात अतिरेकी\nराजीव गांधींनीच नाकारला होता दलितांचा हक्क\nरस्ता सुरक्षा विषय अभ्यासक्रमात असावा\nछत्तीसगडचे राज्यपाल बलरामजी दास टंडन यांचे निधन\nउच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र\nआंदोलनात कोट्यवधींची संपत्ती नष्ट होणे भीषणच\nराजीव गांधींच्या मारेकर्‍यांना मुक्त करण्यास केंद्राचा नकार\nबार डान्समध्ये अश्‍लील काय\nनॅशनल हेरॉल्ड प्रकरणी राहुल गांधींना दिलासा नाही\nक्रमांक ३ वरच न्या. जोसेफ यांचा शपथविधी\nजम्मू-काश्मीरच्या कलम ३५-ए वर उद्या सुनावणी\nतीन न्यायमूर्तींची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती\nन्यायाधीशपदी नातेवाईकांच्या नियुक्तीला चाप लागणार\nपीडित बालकांच्या कुठल्याही छायाचित्राला प्रसिद्धी नको\nशबरीमलात महिलांनाही प्रवेशाचा अधिकार\nपंतप्रधान मोदींनी दिल्या इम्रान खान यांना शुभेच्छा\nट्रम्प यांना प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे निमंत्रण\nकाश्मीरची बदनामी करणार्‍या रिपोर्टमागे पाकिस्तानचा हात\nकोरियन द्वीपकल्पातील शांतता प्रक्रियेत भारताचा सहभाग\nभारत घेणार रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली\nसेशेल्समध्ये भारत उभारणार नाविक तळ\nऑगस्टावेस्टलँड : दलालाचे प्रत्यार्पण करण्यास इटलीचा नकार\nराष्ट्रपती तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना\nभारत-ब्रिटनमध्ये होणार प्रत्यार्पण करार\nबांगलादेश परत घेणार आपले ३३ घुसखोर\nइराणवरील बंधनांना भारताचा पाठिंबा नाही\nवाटले नव्हते, ही व्यक्ती पंतप्रधान होईल\nपंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा नाही : शरद पवार\nघुसखोरांचे आदरातिथ्य करायचे का\nएक राष्ट्र, एक निवडणुकीला काँग्रेसचा विरोध\nमोदी सरकारविरुद्ध आंदोलन उभारणार\nअमित शाह महिन्यातून तीन दिवस बंगाल मुक्कामी…\n१७ विरोधी पक्षांना हवी मतपत्रिका\n…तर भारतात रक्ताचे पाट वाहतील\nकाँग्रेसने मान्य केला बोफोर्स घोटाळा\nखटल्याच्या भीतीने राहुल यांचे ते भाषणच काढले\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\nबुलेट ट्रेनसाठी बीईएमएल बनवणार सुटे भाग\n‘बुल’ उधळला: विक्रमी उच्चांकावर विराजमान\nकाँग्रेसच्या भीतीने हादरला होता शेअर बाजार\nभारती एअरटेल, पेमेंट बँकेचा ईकेवायसी परवाना रद्द\nदूरसंचार क्षेत्रात ७५ हजार कर्मचार्‍यांना नारळ\nऐतिहासिक… निर्देशांक ३३ हजारी\nगुंतवणूकदार २५ लाख कोटींनी मालामाल\nरजनीशकुमार स्टेट बँकेचे नवे अध्यक्ष\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nभारतातच तयार होणार सुपर हॉर्नेट\nआयआरएनएसएस-१ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nनेव्हिगेशनल उपग्रहाचे उद्या प्रक्षेपण\n‘जी-सॅट-६ ए’ चे यशस्वी प्रक्षेपण\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nसंरक्षण मंत्रालयाकडून व्यवहार नाही\nसीमेजवळ तैनात होणार चिनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॉकेट\nलष्कराला मिळणार ४०० आधुनिक तोफा\nभीष्म व अजेय रणगाड्यांना स्वदेशी इंजीन\nसीआरपीएफ जवानांना नवे बुलेट प्रूफ जॅकेट\nइसिसचा अतिरेकी अडकला गुप्तचर यंत्रणेच्या जाळ्यात\nसौराष्ट्र सीमेवर पाकची लढाऊ विमाने\nकोणत्याही आव्हानासाठी लष्कर सज्ज\nअग्नी-५ लवकरच लष्कराच्या शस्त्रागारात\nजवानांना १० हजार रुपये कापड भत्ता\nसर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ आला समोर\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nरोहिंग्या निर्वासित नसून, बेकायदेशीर घुसखोरच : किरेन…\n६१,१६४ किमी महामार्गाची कामे सुरू\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान :…\nस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\nनोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन\nपाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात\n२१ हजारांपेक्षा जास्त भारतीयांचे अमेरिकेत अनधिकृत वास्तव्य\nइराणविरोधात अमेरिकेचे एकतर्फी कठोर फेरनिर्बंध\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान :…\nस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\nनिवडणूक नियमाचे उल्लंघन, इम्रान खान यांचा लेखी…\nइम्रान खान यांना खासदारकीची शपथ घ्यायला सशर्त…\n६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू\nअंटार्क्टिकात तुटला अतिविशाल हिमनग\nनोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन\nभारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था\nमल्ल्याची इंग्लंडमधील मालमत्ता जप्त करण्याचे आदेश\nरासायनिक शस्त्रास्त्र वापर बंदीसंबंधित परिषदेला भारताचा पाठिंबा\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nकॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा\nमुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी\nराज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड\nमराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार\nसमृद्धी महामार्गासाठी एकराला ५० लाख रुपये\n‘चाकण पेटवणार्‍या’ पाच हजार जणांवर गुन्हा\nकमी शब्दात व धारदार पोस्ट असावी\nआता घेता येणार वारीचे लाईव्ह दर्शन\nकर्जमाफी कायमस्वरूपी तोडगा नाही : उपराष्ट्रपती\nऔरंगाबादेत पाणीयुद्ध; नळ कापण्यावरून दोन गटात भीषण…\nआता अयोध्येत मंदिर बांधण्यासाठी जाणार\nवंचितांना यमगरवाडी प्रकल्पाने मुख्य प्रवाहात आणले: भैय्याजी…\nनांदेड महानगरपालिकामध्ये कॉंग्रेसची सत्ता\nमुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी\nतुम्ही फक्त चित्रपट दाखवण्याचे काम करा\nसत्ता मिळाली नाही तरी चालेल, पण भाजपा…\nभाजपाने काँग्रेस, राकाँ फोडली असती, म्हणूनच सत्तेत…\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे…\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nगामा पैलवानसह सहा आरोपी अटकेत\nआजपासून फिफा विश्‍वचषकाची जादू\n फुलराणीने दिले २६ वे सुवर्णपदक\nभारताची सुवर्णझळाळी; एकाच दिवशी १७ पदकांची लूट\nतेजस्विनी, अनिश, बजरंगला सुवर्ण\nकुस्तीपटूंना दोन सुवर्णांसह चार पदके\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nशेअर बाजार नव्या शिखरावर\nशेअर बाजाराचा बैल उधळला\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nध्रुपद गायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे निधन\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nतेरा वैभव अमर रहे माँ\nतेरा वैभव अमर रहे माँ\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\n७३ टक्के नागरिकांचा पंतप्रधान मोदींवर विश्‍वास\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\n‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित\nचिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार\nप्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\nअटल, अढळ आणि अमर…\nअटलजी आजचे श्यामाप्रसाद आहेत\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nअटल, अढळ आणि अमर…\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\nअटलजी आजचे श्यामाप्रसाद आहेत\nमेरा परिचय : अटलजींच्या काव्यप्रतिभेतून प्रकटलेले हिंदुसूक्त\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन…\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nराष्ट्रीय एकता दिनानिमित्त ‘एकतेसाठी दौड’\nपरराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज भूतानमध्ये\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची श्री मंजुनाथस्वामी मंदिरात…\nदशम: सौंदर्यलहरी पारायणोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरूत\nनरेंद्र मोदी यांचे नवे मंत्रिमंडळ\nनव्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन्\nश्री गजानन महाराजांची पालखी पंढरपूर वारीहून परतली\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम…\nविधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान\nAll ई-आसमंत ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१२ ऑगस्ट १८ आसमंत\n०५ ऑगस्ट १८ आसमंत\n२९ जुलै १८ आसमंत\n२२ जुलै १८ आसमंत\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१५ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१४ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n०९ मे १८ सदाफुली\n२७ डिसेंबर १७ सदाफुली\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१५ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१४ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळात एकाच दिवशी शंभर बळी\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…\nवृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…\nजनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nवृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…\nस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\n►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…\n►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…\nकॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा\n►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…\nमुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी\n►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…\nराज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड\n►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…\nतेरा वैभव अमर रहे माँ\n॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…\n॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…\n॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…\n‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित\nअभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…\nचिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार\nऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…\nसंजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…\nसूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49\nHome » अग्रलेख, संपादकीय » मुख्यमंत्र्यांवर विश्‍वास\nसांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव या दोन महत्त्वाच्या महानगरपालिकांवर भाजपाचा झेंडा फडकल्यामुळे, मतदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पूर्ण विश्‍वास दाखविला, हे सिद्ध झाले आहे. भाजपाचा विकास अजेंडा आणि सत्ताधार्‍यांवर विश्‍वास दर्शवून जनतेने भाजपाला भरभरून मते दिली. यावरून वार्‍याचा प्रवाह कोणत्या दिशेला वाहात आहे, हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या चांगले ध्यानात आले असेल. आगामी विधानसभा निवडणुकीची ही छोटीशी झलक आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत चमत्कार घडला. मराठा आंदोलन पेटलेले असताना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करून शासनाच्या विरोधात विषारी प्रचाराची राळ उडवून दिली असताना, भाजपाने ७८ पैकी ४१ जागा जिंकत महापालिकेवर भगवा फडकावला. काँग्रेसला १५ आणि राष्ट्रवादीला २० जागांवरच विजय मिळविता आला. येथे शिवसेनेला खातेही उघडता आले नाही. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आणि मराठाबहुल असलेला जिल्हा म्हणूनच ओळखला जायचा. पण, भाजपाने मारलेल्या जोरदार मुसंडीमुळे जयंत पाटील, विश्‍वजीत कदम, सतेज पाटील या तिघांनाही जोरदार धक्का बसला. सांगलीत सर्वच समुदायाचे लोक राहतात. पण, राष्ट्रवादीचे जितेन्द्र आव्हाड यांनी विषारी भाषण करून आगीत तेल ओतले. त्याचीही तीव्र प्रतिक्रिया उमटली. दोन्ही पक्षांना गटबाजी भोवली. भाजपाने मराठा, धनगर, मुस्लिम, दलित अशा सर्वच समुदायांना तिकिटे देऊन त्यांना निवडून आणले. भाजपाचे ९ पैकी ७ मुस्लिम उमेदवार विजयी झाले. सर्व स्तरातील जनतेने भाजपावर विश्‍वास दर्शवून कौल दिला. भाजपाने अगदी नियोजनबद्ध रीतीने प्रचार केला. फार आधीपासून व्यूहरचना आखली. निवडणूक घोषित झाली, तेव्हा त्यांच्या प्रचाराचा एक टप्पा पूर्ण झाला होता. त्यामुळे नंतर त्यांना अधिक वेळ मिळाला. घरोघरी जाऊन भाजपा कार्यकर्त्यांनी प्रचार केला. जे अन्य पक्षात असंतुष्ट आत्मे होते, त्यांना प्रवेशही दिला. पण, निवडणूक कमळाच्या चिन्हावरच लढावी लागेल, अशी अट घातली. येथे चंद्रकांतदादा पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून खा. संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे. जि. प. अध्यक्ष, सदस्य, पदाधिकारी मैदानात उतरले. काँग्रेसमध्ये मात्र गटबाजीचे एवढे प्रदर्शन झाले की, अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती लढाव्या लागल्या. जयंत पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाले आणि तेेथे काँग्रेसची उपेक्षा सुरू झाली. राष्ट्रवादीची काँग्रेससोबत युती करण्याची अजीबात इच्छा नव्हती. पण, वरून आदेश आला आणि तोंडदेखली युुती झाली. शिवाय जो तो नेता आपल्या गटाचे किती उमेदवार निवडून येतील, याचेच गणित करीत बसला. भाजपाने मात्र विकासाचा अजेंडा पुढे करीत, शांतपणे प्रचार केला. तो मतदारांना भावला. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर अविश्‍वास दर्शवून भाजपाला पसंती दिली. सांगलीच्या निकालांंनी आता काँग्रेसचा उरलासुरला बालेकिल्लाही ढासळला आहे. आधी लोकसभा, विधानसभा, जि. प. आणि आता महापालिकेवरही भाजपाचाच झेंडा लागल्याने सर्व विरोधी नेते गर्भगळीत झाले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आपलेच घर सांभाळू शकत नाहीत, असा संदेश पक्षात गेला आहे. राज्यात मराठा आंदोलन सुरू होते व काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे पक्ष प्रेतांच्या टाळूवरचे लोणी खाण्यात मशगूल होते. भाजपाला कसेही करून पराभूत करण्याचे मनसुबे रचत होते. पण, सर्वच समुदायाच्या मतदारांनी ते पार धुळीस मिळविले आणि विकासाचा अजेंडा पसंत केला. विखारी प्रचाराला गाडून टाकले. जळगावातही सुरेशदादा जैन यांचे ४० वर्षांपासूनचे साम्राज्य भाजपाने उद्ध्वस्त केले. महापालिकेसाठी भाजपाने यावेळी मोठ्या संख्येत महिलांना तिकीट दिले. ७५ पैकी ३३ महिला भाजपाच्या निवडून आल्या. त्यात दोन मुस्लिम भगिनींचा समावेश आहे. याचा अर्थ, भाजपाने खर्‍या अर्थाने महिलांचा सन्मान केला, सशक्तीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल उचलले. याकडे जळगावकरांचे लक्ष होते. एकूण १९ प्रभागांपैकी १३ प्रभागात सर्वच्या सर्व उमेदवार भाजपाचे निवडून आले. या निवडणुकीत एकनाथ खडसे यांनी प्रचार केला नाही. मराठा आंदोलनामुळे मुख्यमंत्री प्रचारासाठी येऊ शकले नाहीत. तरीही गिरीश महाजन यांनी एकहाती धुरा सांभाळून सुरेशदादा जैन यांचे ४० वर्षांचे साम्राज्य तर संपवलेच, शिवसेनेलाही चारीमुंड्या चीत केले. तब्बल ५७ जागांवर विजय संपादन करून सर्वांच्या तोंडचे अक्षरश: पाणीच पळविले. शिवसेना-सुरेशदादा युतीला फक्त १५ जागा मिळाल्या. राष्ट्रवादीला यावेळीही खाते उघडता आले नाहीच पण काँग्रेसलाही जनतेने पूर्ण नाकारले. त्यांनाही शून्य मिळाला. यावेळची निवडणूक तशी पाहता भाजपा आणि शिवसेनेतच झाली. जैन यांच्या काळात कर्जाचा डोेंगर वाढतच चालला होता, परिणामी केवळ हुडकोचेच कर्ज ७०० कोटीपर्यंत गेले. त्यांच्या काळात शहर बकाल झाले होते. अतिक्रमणाचा विळखा प्रचंड वाढला होता. त्यामुळे जनतेचा त्यांच्यावर प्रचंड राग होता. त्यातच अण्णा हजारे यांनी सुरेशदादांवर घरकूल घोटाळ्यात भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले. दादांना आणि राष्ट्रवादीचे मंत्री गुलाबराव पाटील यांना अटक झाली. चार वर्षे ते जेलमध्ये होते. सुरेशदादा व राष्ट्रवादीच्या कपाळी काळा डाग लागला. शिवसेनेला वाटले, दादांच्या मदतीने आपण जळगाव महापालिकेवर कब्जा करू. जनतेने शिवसेनेलाही अशी काही पटकनी दिली की, त्यांना दिवसाच तारे दाखवले जळगाव तशी मोठी व्यापारपेठ, पण विकासच झाला नसल्याने जनता नाराज होती. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले आणि तेथे विकासाचे नवे पर्व सुरू झाले. जळगावच्या विकासासाठी २०० कोटी रु. आणण्याची ग्वाही गिरीश महाजन यांनी दिली. चिंचोलीजवळ एक मोठे मेडिकल हब होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातीलच विद्यार्थ्यांना सर्व वैद्यकीय शाखांचा लाभ होणार आहे. समृद्धी महामार्ग जळगावमधून जात असल्याने त्याचा मोठा फायदा व्यापार्‍यांना होणार आहे. तसेच जळगाव-सूरत, जळगाव-नागपूर, जळगाव-नाशिक, जळगाव-औरंगाबाद या चारही महामार्गांचे चौपदरीकरण केल्यामुळे व्यापाराला मोठी चालना मिळाली आहे. जामनेरजवळ ६०० एकरात नवीन एमआयडीसी, टेक्सटाईल पार्क उभारण्यात येत आहे. याशिवाय जळगावमधील संसाधनात वाढ करण्याच्या दृष्टीने अनेक योजना हाती घेण्यात आल्या आहेत. जनता हे सर्व पाहात होती. विरोधक विषारी प्रचारात मशगूल होते, तर भाजपा विकासाचा अजेंडा राबवीत होती. निकाल समोर आहेत. गिरीश महाजन यांचे जळगावात व चंद्रकांतदादा पाटील यांचे सांगलीत वजन वाढले आहे. आज सांगलीसह राज्यात २७ पैकी १४ महापालिकांमध्ये भाजपाची सत्ता आहे. आगामी काळात दोन्ही जिल्ह्यात केवळ भाजपाच असेल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\nअटल, अढळ आणि अमर…\nFiled under : अग्रलेख, संपादकीय.\nआजपासून फिफा विश्‍वचषकाची जादू\n फुलराणीने दिले २६ वे सुवर्णपदक\nभारताची सुवर्णझळाळी; एकाच दिवशी १७ पदकांची लूट\nतेजस्विनी, अनिश, बजरंगला सुवर्ण\nकुस्तीपटूंना दोन सुवर्णांसह चार पदके\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळात एकाच दिवशी शंभर बळी\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nSAMB on मग न्यायाधीशांसाठी तरी का उभे राहायचे\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nमग न्यायाधीशांसाठी तरी का उभे राहायचे\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\n७/१२ प्रभागाचा : सोलापूर महानगरपालिका निवडणूक २०१७\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (150) आंतरराष्ट्रीय (467) अमेरिका (166) आफ्रिका (7) आशिया (259) ऑस्ट्रेलिया (2) युरोप (32) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (1) ई-पेपर (159) ई-आसमंत (59) ई-मराठवाडा (48) ई-सदाफुली (4) ई-सोलापूर (48) कलाभारत (4) किशोर भारत (2) क्रीडा (20) छायादालन (36) ठळक बातम्या (8) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (886) आसमंत (841) मानसी (10) युवा भरारी (9) विविधा (4) सदाफुली (22) फिचर (16) महाराष्ट्र (435) उ.महाराष्ट्र (3) प.महाराष्ट्र (15) मराठवाडा (5) मुंबई-कोकण (87) विदर्भ (11) सोलापूर (17) रा. स्व. संघ (48) राज्य (738) आंध्र (12) ईशान्य भारत (42) उत्तर प्रदेश (100) ओडिशा (3) कर्नाटक (80) केरळ (31) गुजरात (98) गोवा (11) जम्मू-काश्मीर (94) तामिळनाडू (35) दिल्ली (52) पंजाब-हरयाणा (28) बंगाल (31) बिहार-झारखंड (66) मध्य प्रदेश-छत्तीसगड (21) राजस्थान (21) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,864) अर्थ (76) कृषी (25) नागरी (822) न्यायालय-गुन्हे (262) परराष्ट्र (83) राजकीय (261) वाणिज्य (13) विज्ञान-तंत्रज्ञान (35) संरक्षण (143) संसद (126) सांस्कृतिक (18) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (5) संपादकीय (795) अग्रलेख (382) उपलेख (412) साहित्य (11) स्तंभलेखक (1,031) अजय देशपांडे (34) अपर्णा क्षेमकल्याणी (10) अभय गोखले (25) अविनाश कोल्हे (10) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (29) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (45) डॉ.परीक्षित स. शेवडे (30) डॉ.वाय.मोहितकुमार राव (28) डॉ.सच्चिदानंद शेवडे (28) तरुण विजय (9) दत्ता पंचवाघ (10) दीपक कलढोणे (36) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (3) ब्रि. हेमंत महाजन (55) भाऊ तोरसेकर (111) मल्हार कृष्ण गोखले (52) यमाजी मालकर (35) योगानंद काळे (1) रत्नाकर पिळणकर (27) रमेश पतंगे (11) रविंद्र दाणी (57) ल.त्र्यं. जोशी (19) वसंत काणे (18) श्याम परांडे (20) श्याम पेठकर (55) श्यामकांत जहागीरदार (57) श्रीकांत पवनीकर (10) श्रीनिवास वैद्य (48) सतीष भा. मराठे (6) सुधीर पाठक (6) सुनील कुहीकर (52) सोमनाथ देशमाने (34) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (26)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nरवींद्र दाणी | सर्वोच्च न्यायालयात अखेर संघर्षविराम झाला. उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. जोसेफ यांना सर्वोच्च न्यायालयात बढती देण्याच्या ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-08-18T08:59:31Z", "digest": "sha1:KQ6N7TFGHO33D4SWMMIQ7S5OHHDX5FCM", "length": 8402, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विचित्रवीर्य - विकिपीडिया", "raw_content": "\nविचित्रवीर्य हे महाभारतातील एक पात्र आहे. तो हस्तिनापूरचा राजा शंतनू व सत्यवती यांचा मुलगा, चित्रांगदाचा लहान भाऊ व भीष्माचा सावत्र भाऊ होता.\nचित्रांगदाच्या मृत्यूनंतर भीष्माच्या देखरेखीखाली विचित्रवीर्याला हस्तिनापूरचा राजा बनवले गेले. भीष्माची इच्छा असते की त्याचा विवाह काशीच्या राजाच्या मुली अंबा, अंबिका व अंबालिका यांच्याशी व्हावा. मात्र जुन्या वितुष्टामुळे काशीचा राजा हस्तिनापूर साम्राज्याला स्वयंवराचे आमत्रण देत नाही. तेव्हा क्रोधित होऊन भीष्म स्वयंवरात जातो व तेथील उपस्थित राजांना पराजित करून अंबा, अंबिका व अंबालिकाला घेऊन हस्तिनापूरला घेऊन येतो. मात्र अंबाने मनोमन शाल्व राजकुमाराला आपला पती मानले असल्यामुळे अंबिका व अंबालिका यांचा विवाह विचित्रवीर्यासोबत करून दिला जातो.\nमात्र विवाहानंतर मूल होण्याच्या आधीच क्षय रोगाने विचित्रवीर्याचा मृत्यू होतो. तेव्हा सत्यवतीच्या आज्ञेनुसार व्यासांकडून अंबिका, अंबालिका व त्यांची एक दासी यांना अनुक्रमे धृतराष्ट्र, पांडू व विदुर ही मुले होतात. धृतराष्ट्र जेष्ठ भाऊ असूनसुद्धा तो जन्मजात अंध असल्यामुळे पांडू हस्तिनापूरचा विचित्रवीर्यानंतरचा राजा बनतो.\nआदि पर्व · सभा पर्व · अरण्यक पर्व · विराट पर्व · उद्योग पर्व · भीष्म पर्व · द्रोण पर्व · कर्ण पर्व · शल्य पर्व · सौप्तिक पर्व · स्त्री पर्व · शांति पर्व · अनुशासन पर्व · अश्वमेधिक पर्व · आश्रमवासिक पर्व · मौसल पर्व · महाप्रस्थानिका पर्व · स्वर्गारोहण पर्व · हरिवंश पर्व\nशंतनू · गंगा · देवव्रत (भीष्म) · सत्यवती · चित्रांगद · विचित्रवीर्य · अंबिका · अंबालिका · विदुर · धृतराष्ट्र · गांधारी · शकुनी · सुभद्रा · पंडू · कुंती · माद्री · युधिष्ठिर · भीम · अर्जुन · नकुल · सहदेव · दुर्योधन · दुःशासन · युयुत्सु · दुःशला · द्रौपदी · हिडिंबा · घटोत्कच · अहिलावती · उत्तरा · उलूपी · चित्रांगदा\nअंबा · बारबरीका · बभ्रुवाहन · इरावान् · अभिमन्यू · परीक्षित · विराट · कीचक · कृपाचार्य · द्रोणाचार्य · अश्वत्थामा · एकलव्य · कृतवर्मा · जरासंध · सात्यकी · मयासुर · दुर्वास · संजय · जनमेजय · व्यास · कर्ण · जयद्रथ · कृष्ण · बलराम · द्रुपद · हिडिंब · धृष्टद्युम्न · शल्‍य · अधिरथ · शिखंडी\nपांडव · कौरव · हस्तिनापुर · इंद्रप्रस्थ · कुरुक्षेत्र · भगवद्‌गीता · महाभारतीय युद्ध · महाभारतातील संवाद\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ ऑक्टोबर २०१४ रोजी २२:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%8F/", "date_download": "2018-08-18T08:00:01Z", "digest": "sha1:RRFF7LNUGVSQ5ISRZNVUBVNJEQJLP7VB", "length": 6048, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अणेमध्ये चोरट्यांनी एटीएम फोडले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअणेमध्ये चोरट्यांनी एटीएम फोडले\nअणे- अज्ञात चोरट्यांनी अणे (ता. जुन्नर) येथे शुक्रवारी (दि.10) पहाटेच्या सुमारास तीन ठिकाणी डल्ला मारून रंगनाथ भागाजी देशमुख यांच्या जागेत असलेल्या खासगी कंपनीच्या एटीएम मशीन फोडले. मात्र, चोरट्यांना “रोकड’चा लॉकर खोलण्यात अपयश आल्याने रक्कम वाचली. मात्र, लगतच्या एका हॉटेल आणि स्पेअरपार्टच्या दुकानामध्ये प्रवेश करून चोरट्यांनी दहा हजार रुपयांची रोकड लंपास केली. दोन दिवसांपूर्वी बेल्हे येथे बाजार समितीच्या व्यापारी गाळ्यातील चार दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली होती. त्यापुर्वी आळेफाटा येथील नऊ दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली. बेल्हे, आळेफाटा आणि आणे येथे हा घडलेल्या चोऱ्या आळेफाटा पोलीस ठाणे तसेच बेल्हे पोलीस दूरक्षेत्राच्या आणि अणे पोलीस मदत केंद्रांच्या हाकेच्या अंतरावर आहेत. त्यामुळे आळेफाटा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी या भागात गस्ती वाढवण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleहवामानतील बदलामुळे फ्लॉवरचे पीक धोक्‍यात\nNext articleघरफोडी करणाऱ्या सराईताला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%9A", "date_download": "2018-08-18T08:58:38Z", "digest": "sha1:QHWX3FQGKBIPN6CR4E67PQ362IPDOSTY", "length": 5750, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मारिन चिलिच - विकिपीडिया", "raw_content": "\n२८ सप्टेंबर, १९८८ (1988-09-28) (वय: २९)\nमेद्युगोर्ये, बॉस्निया आणि हर्झगोव्हिना\nउजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड\nचौथी फेरी (२००९, २०१०)\nचौथी फेरी (२००८, २०१२)\nउपांत्यपूर्व फेरी (२००९, २०१२)\nशेवटचा बदल: जानेवारी २०१३.\nमारिन चिलिच (सर्बो-क्रोएशियन: Marin Čilić; जन्म: २८ सप्टेंबर १९८८) हा एक व्यावसायिक क्रोएशियन टेनिसपटू आहे. २००५ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या चिलिचने आजवर ८ एकेरी स्पर्धा जिंकल्या असून त्याने भारतामधील चेन्नई ओपन दोनवेळा जिंकली आहे.\nअसोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्सच्या संकेतस्थळावर मारिन चिलिचचे पान\nइ.स. १९८८ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०२:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%81.php", "date_download": "2018-08-18T09:08:50Z", "digest": "sha1:XFCMEHD5SP7I3V2NUY5DW7GHA4F4KHOA", "length": 73273, "nlines": 1233, "source_domain": "tarunbharat.org", "title": "मराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार | Tarun Bharat", "raw_content": "\nवीर संघवी, ज्येष्ठ पत्रकार\nउजव्या विचारसरणीला एक मंच उपलब्ध होईल म्हणून पुद्दुचेरी साहित्य उत्सव रद्द करण्याची डाव्यांची मागणी विचित्र...\nप्रशांत उमराव, वकील, सर्वोच्च न्यायालय\nमेरठमध्ये हेलिकॉप्टरमधून शिवभक्त कावडियांवर फुलांचा वर्षाव करणारे मेरठ भागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांना...\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळात एकाच दिवशी शंभर बळी\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nआयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ\nअजित वाडेकर यांचे निधन\nकेरळमध्ये पावसाचे ७७ बळी; १८ हजार बेघर\nवीर संघवी, ज्येष्ठ पत्रकार\nAll अर्थ कृषी नागरी न्यायालय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nआयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ\nअजित वाडेकर यांचे निधन\nसीआरपीएफला सर्वाधिक शौर्य पदके\nमहाराष्ट्राला ५१ पोलिस पदके\nहवाई दल जवानाच्या वेषात अतिरेकी\nराजीव गांधींनीच नाकारला होता दलितांचा हक्क\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nरस्ता सुरक्षा विषय अभ्यासक्रमात असावा\nडिजिटल व्यवहारांवर २० टक्के कॅशबॅक\nघर, वाहनकर्ज महागले; व्याजदरात ०.२५ टक्क्यांची वाढ\nमहसूल वाढल्याने जीएसटी घटणार\nनिर्देशांक नव्या विक्रमी उच्चांकावर\n‘डिमांड ड्राफ्ट’च्या नियमात बदल\nडॉलरसमोर रुपया सक्षम, मोदी सरकार धैर्यवान\nदेशभर आज जीएसटी दिवस पाळणार\nआर्थिक सल्लागार भारतीय मूल्ये जोपासणारा असावा\nसरकारी बँकांमध्ये लोकांचा पैसा सुरक्षित\nनागरिकांना प्रामाणिकपणे कर भरण्याची विनंती\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nविदर्भ, मराठवाड्यातील आठ सिंचन प्रकल्पांना केंद्राची मदत\nयंदा ९७ टक्के पाऊस\nहमीभावात दीडपट वाढ होणारच\nशेतीपर्यंत पाणी नेण्याची गरज : नितीन गडकरी\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nआयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ\nअजित वाडेकर यांचे निधन\nसीआरपीएफला सर्वाधिक शौर्य पदके\nमहाराष्ट्राला ५१ पोलिस पदके\nहवाई दल जवानाच्या वेषात अतिरेकी\nराजीव गांधींनीच नाकारला होता दलितांचा हक्क\nरस्ता सुरक्षा विषय अभ्यासक्रमात असावा\nछत्तीसगडचे राज्यपाल बलरामजी दास टंडन यांचे निधन\nउच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र\nआंदोलनात कोट्यवधींची संपत्ती नष्ट होणे भीषणच\nराजीव गांधींच्या मारेकर्‍यांना मुक्त करण्यास केंद्राचा नकार\nबार डान्समध्ये अश्‍लील काय\nनॅशनल हेरॉल्ड प्रकरणी राहुल गांधींना दिलासा नाही\nक्रमांक ३ वरच न्या. जोसेफ यांचा शपथविधी\nजम्मू-काश्मीरच्या कलम ३५-ए वर उद्या सुनावणी\nतीन न्यायमूर्तींची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती\nन्यायाधीशपदी नातेवाईकांच्या नियुक्तीला चाप लागणार\nपीडित बालकांच्या कुठल्याही छायाचित्राला प्रसिद्धी नको\nशबरीमलात महिलांनाही प्रवेशाचा अधिकार\nपंतप्रधान मोदींनी दिल्या इम्रान खान यांना शुभेच्छा\nट्रम्प यांना प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे निमंत्रण\nकाश्मीरची बदनामी करणार्‍या रिपोर्टमागे पाकिस्तानचा हात\nकोरियन द्वीपकल्पातील शांतता प्रक्रियेत भारताचा सहभाग\nभारत घेणार रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली\nसेशेल्समध्ये भारत उभारणार नाविक तळ\nऑगस्टावेस्टलँड : दलालाचे प्रत्यार्पण करण्यास इटलीचा नकार\nराष्ट्रपती तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना\nभारत-ब्रिटनमध्ये होणार प्रत्यार्पण करार\nबांगलादेश परत घेणार आपले ३३ घुसखोर\nइराणवरील बंधनांना भारताचा पाठिंबा नाही\nवाटले नव्हते, ही व्यक्ती पंतप्रधान होईल\nपंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा नाही : शरद पवार\nघुसखोरांचे आदरातिथ्य करायचे का\nएक राष्ट्र, एक निवडणुकीला काँग्रेसचा विरोध\nमोदी सरकारविरुद्ध आंदोलन उभारणार\nअमित शाह महिन्यातून तीन दिवस बंगाल मुक्कामी…\n१७ विरोधी पक्षांना हवी मतपत्रिका\n…तर भारतात रक्ताचे पाट वाहतील\nकाँग्रेसने मान्य केला बोफोर्स घोटाळा\nखटल्याच्या भीतीने राहुल यांचे ते भाषणच काढले\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\nबुलेट ट्रेनसाठी बीईएमएल बनवणार सुटे भाग\n‘बुल’ उधळला: विक्रमी उच्चांकावर विराजमान\nकाँग्रेसच्या भीतीने हादरला होता शेअर बाजार\nभारती एअरटेल, पेमेंट बँकेचा ईकेवायसी परवाना रद्द\nदूरसंचार क्षेत्रात ७५ हजार कर्मचार्‍यांना नारळ\nऐतिहासिक… निर्देशांक ३३ हजारी\nगुंतवणूकदार २५ लाख कोटींनी मालामाल\nरजनीशकुमार स्टेट बँकेचे नवे अध्यक्ष\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nभारतातच तयार होणार सुपर हॉर्नेट\nआयआरएनएसएस-१ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nनेव्हिगेशनल उपग्रहाचे उद्या प्रक्षेपण\n‘जी-सॅट-६ ए’ चे यशस्वी प्रक्षेपण\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nसंरक्षण मंत्रालयाकडून व्यवहार नाही\nसीमेजवळ तैनात होणार चिनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॉकेट\nलष्कराला मिळणार ४०० आधुनिक तोफा\nभीष्म व अजेय रणगाड्यांना स्वदेशी इंजीन\nसीआरपीएफ जवानांना नवे बुलेट प्रूफ जॅकेट\nइसिसचा अतिरेकी अडकला गुप्तचर यंत्रणेच्या जाळ्यात\nसौराष्ट्र सीमेवर पाकची लढाऊ विमाने\nकोणत्याही आव्हानासाठी लष्कर सज्ज\nअग्नी-५ लवकरच लष्कराच्या शस्त्रागारात\nजवानांना १० हजार रुपये कापड भत्ता\nसर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ आला समोर\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nरोहिंग्या निर्वासित नसून, बेकायदेशीर घुसखोरच : किरेन…\n६१,१६४ किमी महामार्गाची कामे सुरू\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान :…\nस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\nनोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन\nपाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात\n२१ हजारांपेक्षा जास्त भारतीयांचे अमेरिकेत अनधिकृत वास्तव्य\nइराणविरोधात अमेरिकेचे एकतर्फी कठोर फेरनिर्बंध\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान :…\nस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\nनिवडणूक नियमाचे उल्लंघन, इम्रान खान यांचा लेखी…\nइम्रान खान यांना खासदारकीची शपथ घ्यायला सशर्त…\n६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू\nअंटार्क्टिकात तुटला अतिविशाल हिमनग\nनोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन\nभारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था\nमल्ल्याची इंग्लंडमधील मालमत्ता जप्त करण्याचे आदेश\nरासायनिक शस्त्रास्त्र वापर बंदीसंबंधित परिषदेला भारताचा पाठिंबा\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nकॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा\nमुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी\nराज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड\nमराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार\nसमृद्धी महामार्गासाठी एकराला ५० लाख रुपये\n‘चाकण पेटवणार्‍या’ पाच हजार जणांवर गुन्हा\nकमी शब्दात व धारदार पोस्ट असावी\nआता घेता येणार वारीचे लाईव्ह दर्शन\nकर्जमाफी कायमस्वरूपी तोडगा नाही : उपराष्ट्रपती\nऔरंगाबादेत पाणीयुद्ध; नळ कापण्यावरून दोन गटात भीषण…\nआता अयोध्येत मंदिर बांधण्यासाठी जाणार\nवंचितांना यमगरवाडी प्रकल्पाने मुख्य प्रवाहात आणले: भैय्याजी…\nनांदेड महानगरपालिकामध्ये कॉंग्रेसची सत्ता\nमुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी\nतुम्ही फक्त चित्रपट दाखवण्याचे काम करा\nसत्ता मिळाली नाही तरी चालेल, पण भाजपा…\nभाजपाने काँग्रेस, राकाँ फोडली असती, म्हणूनच सत्तेत…\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे…\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nगामा पैलवानसह सहा आरोपी अटकेत\nआजपासून फिफा विश्‍वचषकाची जादू\n फुलराणीने दिले २६ वे सुवर्णपदक\nभारताची सुवर्णझळाळी; एकाच दिवशी १७ पदकांची लूट\nतेजस्विनी, अनिश, बजरंगला सुवर्ण\nकुस्तीपटूंना दोन सुवर्णांसह चार पदके\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nशेअर बाजार नव्या शिखरावर\nशेअर बाजाराचा बैल उधळला\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nध्रुपद गायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे निधन\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nतेरा वैभव अमर रहे माँ\nतेरा वैभव अमर रहे माँ\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\n७३ टक्के नागरिकांचा पंतप्रधान मोदींवर विश्‍वास\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\n‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित\nचिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार\nप्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\nअटल, अढळ आणि अमर…\nअटलजी आजचे श्यामाप्रसाद आहेत\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nअटल, अढळ आणि अमर…\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\nअटलजी आजचे श्यामाप्रसाद आहेत\nमेरा परिचय : अटलजींच्या काव्यप्रतिभेतून प्रकटलेले हिंदुसूक्त\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन…\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nराष्ट्रीय एकता दिनानिमित्त ‘एकतेसाठी दौड’\nपरराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज भूतानमध्ये\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची श्री मंजुनाथस्वामी मंदिरात…\nदशम: सौंदर्यलहरी पारायणोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरूत\nनरेंद्र मोदी यांचे नवे मंत्रिमंडळ\nनव्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन्\nश्री गजानन महाराजांची पालखी पंढरपूर वारीहून परतली\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम…\nविधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान\nAll ई-आसमंत ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१२ ऑगस्ट १८ आसमंत\n०५ ऑगस्ट १८ आसमंत\n२९ जुलै १८ आसमंत\n२२ जुलै १८ आसमंत\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१५ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१४ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n०९ मे १८ सदाफुली\n२७ डिसेंबर १७ सदाफुली\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१५ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१४ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळात एकाच दिवशी शंभर बळी\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…\nवृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…\nजनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nवृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…\nस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\n►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…\n►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…\nकॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा\n►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…\nमुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी\n►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…\nराज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड\n►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…\nतेरा वैभव अमर रहे माँ\n॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…\n॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…\n॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…\n‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित\nअभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…\nचिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार\nऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…\nसंजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…\nसूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49\nHome » महाराष्ट्र » मराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार\nमराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार\n►उच्च न्यायालयात याचिका दाखल,\nमुंबई, ९ ऑगस्ट –\nमराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज संपूर्ण राज्यभर करण्यात आलेल्या आंदोलनात सुरुवातीला शांतता दिसून आल्यानंतर हिंसाचारही घडून आला. राज्यात अनेक ठिकाणी लाठीमार, सरकारविरोधी घोषणाबाजी, लोकप्रतिनिधींच्या वाहनांची तोडफ ोड, दगडफे क, टायर पेटवणे, वाहनांच्या जाळपोळीचे प्रकार घडले. औरंगाबादेत पोलिसांना गोळीबार करावा लागला. तसेच, मुंबई, नवी मुंबई या महानगरात ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान, या हिंसाचाराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, १३ ऑगस्टला सुनावणी होणार असल्याचे वृत्त आहे.\nऔरंगाबाद : आंदोलनकर्त्यांनी वाळूज एमआयडीसीमध्ये कंटेनर पेटवला. तसेच, तीन ते चार कंपन्यांमध्ये तोडफोड केल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवल्यानंतर जमावाला नियंत्रित करण्यात आले. त्यापूर्वी पोलिसांनी हवेत अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. तसेच, आंदोलनकर्त्यांवर लाठीमार केल्याने पोलिसांवरही दगडफे क करण्यात आली. यावेळी एक खाजगी बस आणि पोलिस वाहनही जाळल्याचे सांगण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात आंदोलकांनी बदनापूर तालुक्यातील दाभाडी, फुलंब्री, राजूर, भोकरदन-जाफ्राबाद रस्त्यावर टायर पेटवल्याने वाहतूक खोळंबली.\nपुणे : शहरात सकाळी दहा वाजता एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दुचाकी रॅली काढण्यात आली. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. सुरुवातीला शांत असलेल्या आंदोलकांनी अचानक जिल्हाधिकारी कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. तसेच, बाहेरून चपला आणि प्लॅस्टिकच्या बाटल्याही फे कण्यात आल्या. कार्यालयातील सुरक्षारक्षकांच्या केबिनमध्ये तोडफोड करण्यात आली. परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाल्याने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.\nठाणे : मराठा समाज आंदोलकांकडून ठाण्यात बंद नसल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली होती, तरीही शहरात बंदचा परिणाम दिसून आला. ठाणे परिवहन सेवेच्या बसेस सकाळी १० वाजतापर्यंत बाहेर पडल्या नाहीत. मागील वेळी आंदोलन झालेल्या नितीन कंपनी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस दल तैनात करण्यात आले. केवळ तुरळक खासगी वाहने रस्त्यांवर धावत होती. एकंदर आज ठाण्यात शांत वातावरण पाहावयास मिळाले.\nसातारा : सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे कुलस्वामी दैवत श्रीखंडेरायाला साकडे घालून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आरक्षणाचा जागर आणि गोंधळ घातला. इतकी वर्षे आरक्षणाची मागणी करत असताना कुठल्याही राज्यकर्त्याला पाझर फुटत नसल्याने आंदोलकांनी थेट कुलदैवतांचाच धावा केला. हालअपेष्टा, गार्‍हाणी सरकारला ऐकू जात नसल्याने जागर, गोंधळ आणि भजन गायनातून मराठा समाजाने त्यांच्या व्यथा मांडल्या.\nलातूर : लातूर जिल्ह्यात मध्यरात्रीपासूनच आंदोलनाला सुरुवात झाली. लातूर-बार्शी महामार्गावरील साखरा पाटी येथे टायर जाळून रास्तारोको करण्यात आला. टायर पेटवून प्रचंड घोषणाबाजी करत आरक्षणाची मागणी करण्यात आली. दरम्यान, हिंसक आंदोलने होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला. मराठा आंदोलनात आमदार अमित विलासराव देशमुख यांनीही सहभाग घेतला. याशिवाय मुंबई, नवी मुंबई, नाशिक जिल्ह्यातही आंदोलन करण्यात आले.\nआंदोलनादरम्यान अनेक शहरातील शाळा महाविद्यालयांना सुटी देण्यात आली. लहान मोठ्या बाजारपेठा बंद होत्या. शासकीय रुग्णालये आणि औषधी दुकाने वगळता किराणामालाची दुकाने, खाजगी कार्यालये, बँका, पेट्रोल पंप, सोनेचांदीची दुकाने, कपड्यांची दुकाने, हॉटेल्स, चहाटपर्‍या आदी लहान मोठी दुकाने बंद असल्याचे दिसून आले. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बंद ठेवल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता. दरम्यान, मराठा आंदोलनकर्त्यांचा मागील अनुभव लक्षात घेता अनेक शहरात राज्य राखीव पोलिस दल, अग्निशमन दल, बचाव पथके, गृहरक्षक दल आदी तैनात ठेवण्यात आले होते.\nकॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा\nराज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड\nसरकारी कर्मचार्‍यांचा संप मागे\nसरकारी कर्मचार्‍यांचा संप मागे\nराज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड\nFiled under : महाराष्ट्र.\nआजपासून फिफा विश्‍वचषकाची जादू\n फुलराणीने दिले २६ वे सुवर्णपदक\nभारताची सुवर्णझळाळी; एकाच दिवशी १७ पदकांची लूट\nतेजस्विनी, अनिश, बजरंगला सुवर्ण\nकुस्तीपटूंना दोन सुवर्णांसह चार पदके\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळात एकाच दिवशी शंभर बळी\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nSAMB on मग न्यायाधीशांसाठी तरी का उभे राहायचे\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nमग न्यायाधीशांसाठी तरी का उभे राहायचे\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\n७/१२ प्रभागाचा : सोलापूर महानगरपालिका निवडणूक २०१७\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (150) आंतरराष्ट्रीय (467) अमेरिका (166) आफ्रिका (7) आशिया (259) ऑस्ट्रेलिया (2) युरोप (32) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (1) ई-पेपर (159) ई-आसमंत (59) ई-मराठवाडा (48) ई-सदाफुली (4) ई-सोलापूर (48) कलाभारत (4) किशोर भारत (2) क्रीडा (20) छायादालन (36) ठळक बातम्या (8) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (886) आसमंत (841) मानसी (10) युवा भरारी (9) विविधा (4) सदाफुली (22) फिचर (16) महाराष्ट्र (435) उ.महाराष्ट्र (3) प.महाराष्ट्र (15) मराठवाडा (5) मुंबई-कोकण (87) विदर्भ (11) सोलापूर (17) रा. स्व. संघ (48) राज्य (738) आंध्र (12) ईशान्य भारत (42) उत्तर प्रदेश (100) ओडिशा (3) कर्नाटक (80) केरळ (31) गुजरात (98) गोवा (11) जम्मू-काश्मीर (94) तामिळनाडू (35) दिल्ली (52) पंजाब-हरयाणा (28) बंगाल (31) बिहार-झारखंड (66) मध्य प्रदेश-छत्तीसगड (21) राजस्थान (21) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,864) अर्थ (76) कृषी (25) नागरी (822) न्यायालय-गुन्हे (262) परराष्ट्र (83) राजकीय (261) वाणिज्य (13) विज्ञान-तंत्रज्ञान (35) संरक्षण (143) संसद (126) सांस्कृतिक (18) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (5) संपादकीय (795) अग्रलेख (382) उपलेख (412) साहित्य (11) स्तंभलेखक (1,031) अजय देशपांडे (34) अपर्णा क्षेमकल्याणी (10) अभय गोखले (25) अविनाश कोल्हे (10) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (29) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (45) डॉ.परीक्षित स. शेवडे (30) डॉ.वाय.मोहितकुमार राव (28) डॉ.सच्चिदानंद शेवडे (28) तरुण विजय (9) दत्ता पंचवाघ (10) दीपक कलढोणे (36) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (3) ब्रि. हेमंत महाजन (55) भाऊ तोरसेकर (111) मल्हार कृष्ण गोखले (52) यमाजी मालकर (35) योगानंद काळे (1) रत्नाकर पिळणकर (27) रमेश पतंगे (11) रविंद्र दाणी (57) ल.त्र्यं. जोशी (19) वसंत काणे (18) श्याम परांडे (20) श्याम पेठकर (55) श्यामकांत जहागीरदार (57) श्रीकांत पवनीकर (10) श्रीनिवास वैद्य (48) सतीष भा. मराठे (6) सुधीर पाठक (6) सुनील कुहीकर (52) सोमनाथ देशमाने (34) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (26)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nसरकारी कर्मचार्‍यांचा संप मागे\n►१४ महिन्यांची थकबाकी दिवाळीपर्यंत, तभा वृत्तसेवा मुंबई, ९ ऑगस्ट - उरलेल्या सात महिन्यांच्या महागाई भत्त्याची भरपाई दिवाळीपर्यंत करण्याची, तसेच जानेवारीपर्यंत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-08-18T08:00:59Z", "digest": "sha1:K4ZJ5LZOOBJGSCKOO2O67MIZW7GAJ7EV", "length": 13234, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पोलीस अधीक्षकांना चोरट्यांची श्रीगोंद्यात अनोखी सलामी! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपोलीस अधीक्षकांना चोरट्यांची श्रीगोंद्यात अनोखी सलामी\nढोकराई(ता.श्रीगोंदे)- येथील चोरी झालेल्या ठिकाणी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी येऊन पाहणी केली.\nशहारासह काष्टी, ढोकराई, कारखाना, कोळगाव परिसरात चोरीच्या घटना : सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या घरीही चोरी\nश्रीगोंदे – पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा शनिवारी एका कार्यक्रमासाठी तालुक्‍याच्या दौऱ्यावर होते. मात्र शनिवारी रात्री शहरासह काष्टी, ढोकराई, श्रीगोंदे कारखाना, कोळगाव शिवारात चोऱ्या करीत चोरट्यांनी पोलीस अधीक्षकांना अनोखी सलामी दिली. शहरात तर एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला.\nतालुक्‍यातील काष्टी येथील तुळसाई नगरमध्ये चंद्रशेखर काळे यांचे बांधकाम व्यवसायाशी निगडित दुकान आहे. काळे यांच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. वीस हजार किमतीचा लॅपटॉप आणि 68 हजार रुपये असा एकूण 88 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना शुक्रवारी (दि.3) सकाळी उघडकीस आली. चंद्रशेखर काळे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदविला आहे.\nश्रीगोंदे शहरातील हनुमाननगरमध्ये भाऊसाहेब साबळे या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचे घर आहे. शनिवारी मध्यरात्री त्यांचे घर बंद असल्याने घर फोडले, मात्र ऐवज चोरीला गेला नाही. साबळे यांच्या शेजारील गाडीलकर यांच्या घराची खिडकी तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. खिडकीतून घरात प्रवेश करत आतून कडी लावत निवांतपणे जवळपास दीड लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरून नेला. भागवत नागनाथ बुऱ्हाडे (रा. दौंड, ता. दौंड) यांचे काष्टी येथे भगवती ज्वेलर्स नावाने सराफाचे दुकान आहे. शनिवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास बुऱ्हाडे यांच्या दुकानाचे सायरन वरून बुऱ्हाडे यांना संदेश गेला. याचवेळी गाळामालक प्रकाश पाचपुते यांनी चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटल्याचे फोनवर सांगितले. मात्र दुकानाचा सायरन वाजल्याने चोरटे पळून गेले. याबाबत बुऱ्हाडे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदे पोलिसांनी अज्ञात व्यक्‍तींविरुद्ध शटर उचकटून चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.\nतालुक्‍यातील ढोकराई फाटा येथे सुनील यादव या परप्रांतीय व्यक्तीचे दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे तो आपल्या सहकऱ्यांसह शेजारील गाळ्यात झोपला होता. शनिवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास काही चोरट्यांनी येऊन दमदाटी करीत त्याच्याकडे असलेली चाळीस हजार रुपयांची रक्‍कम लंपास केली. त्याने ही रक्‍कम दूध उत्पादकांचे पगार करण्यासाठी आणल्याची माहिती समजली. त्याचबरोबर शनिवारी रात्री श्रीगोंदे कारखाना येथील बारामतीकर ज्वेलर्स या सराफ दुकानाचे शटर तोडून चोरांनी आतमध्ये प्रवेश केला. या दुकानातून चोरांनी सोन्याच्या काही दागिन्यांसह इंटरनेटचे मोडेम, दूरध्वनीची आदींची चोरी केली. या चोरांनी या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखील तोडफोड केली. त्याचबरोबर कोळगाव फाटा येथून प्रसाद गजानन शिंदे यांच्या राहत्या घरासमोरून शनिवारी रात्री महिंद्रा स्कॉर्पिओ (एम. एच. 02 ए व्ही 5139) ही चारचाकी चोरीला गेली. चारचाकी प्रसाद शिंदे यांची चुलती भारती गणेश शिंदे यांच्या नावावर आहे. त्या मुंबईत वास्तव्यास आहेत. याबत प्रसाद शिंदे यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदविला आहे. बेलवंडी हद्दीतून काही दुचाकीदेखील चोरीला गेल्याचे समजते.\nटायर फुटला अन्‌ चोर निसटले…\nशनिवारी रात्री पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना पहाटे चार वाजेच्या सुमारास सहायक फौजदार अनिल भारती, संभाजी वाबळे यांना विठाई पतसंस्थेसमोर एक चारचाकी संशयितरित्या उभी असल्याचे पाहिले. पोलिसांनी या गाडीजवळ जाण्याचा प्रयत्न केला असता ती गाडी नगरच्या दिशेने भरधाव वेगाने निघाली. पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र काही अंतरावर जाताच पोलिसांच्या वाहनाचा टायर फुटल्याने चोर पळून जाण्यात यशस्वी झाले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleबोधेगावसह 54 गावातील पिकांनी टाकल्या माना..\nआलिशान गाड्यांत फिरणाऱ्या नेतेमंडळींकडे ‘सोशल मीडिया’वरून गाऱ्हाणे\nआ. अौटींचे तडजोडीचे राजकारण संपवणार\nअनेक चोऱ्यांचा तपास प्रलंबित, कर्मचारी संख्या अल्प\nशालेय पोषण आहाराचा माल निकृष्ट\nठिबककडे ऊस उत्पादकांची पाठ\nवाहतूक पोलिसांकडून 91 लाखांचा दंड वसूल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-18T08:00:55Z", "digest": "sha1:MQLWACDD2SPUCEYXL64SQ6V4MV4EXELQ", "length": 9808, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुंबईत औषधाच्या विषबाधेतून विद्यार्थीनीचा मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमुंबईत औषधाच्या विषबाधेतून विद्यार्थीनीचा मृत्यू\nगोवंडी येथील पालिकेच्या शाळेतील प्रकार : 160 विद्यार्थी रुग्णालयात\nमुंबई – शाळेत दिल्या जाणाऱ्या औषधातून विषबाधा झाल्याने एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. चांदणी साहिल शेख असे या मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तर 160 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. हा प्रकार मुंबईतील गोवंडी येथील महापालिकेच्या शाळेत घडला.\nसंजय नगरमधील उर्दू माध्यमाच्या पालिकेच्या शाळेत सोमवारी विद्यार्थ्यांना औषधे देण्यात आली होती. या औषधातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या विषबाधेमुळे चांदणी शेख हिचा मृत्यू झाला. तसेच अन्य विद्यार्थ्यांना उपचारासाठी घाटकोपर येथील सरकारी रूग्णालय आणि गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nशाळेतील विद्यार्थ्यांना कॅल्शियम, रक्तवाढीची औषधे दिली जात होती. मात्र या औषधांनी विद्यार्थ्यांना उलट्या आणि जळजळ होऊ लागली. हा त्रास अनेक विद्यार्थ्यांना होऊ लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या सर्व मुलांची बालरोगतज्ञांकडून तपासणी करुन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती बीएमसीच्या अधिका-यांनी दिली.\nशाळेतल्या मधल्या सुट्टीत मुलांना देण्यात येणारे जेवण आणि गोळयांचे काही नमुने तपासणीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. मुलांना ज्या गोळया वाटण्यात आल्या त्या आर्यन आणि फॉलिक ऍसिडच्या गोळया होत्या. शिवाजीनगर पोलीस स्थानकात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nया सर्व प्रकारामुळे गोवंडी परिसरात एकच खळबळ उडाली. विद्यार्थ्यांना नेमकी कोणती औषधे दिली. या प्रकारात कोणी हलगर्जी केली, याबाबत आता चौकशी होत आहे.\nयाबाबत कार्यकारी आरोग्य अधिकारी पद्मजा केसकर म्हणाले, विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या गोळ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच मुलीच्या मृत्यूचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. या प्रकरणाची सखोल तपासणी करण्यात येणार असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.\nदरम्यान, ही माहिती मिळाल्यानंतर जमलेल्या पालकांनी शाळेविरोधात घोषणा देऊन शाळेत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार करुन गर्दीला पांगविण्यात आले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशिक्षण समितीत केवळ नगरसेवकच असण्याची शक्‍यता\nNext articleजुलै महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट\nपोलीस कर्मचाऱ्याने वाचवले ज्येष्ठाचे प्राण\n“प्रत्येकाच्या मनात सद्भावना असल्यास देशात सहिष्णुता नांदेल’\nसर्व शाळांत राबविणार स्वच्छ भारत पंधरवडा\nसमुपदेशनासाठी नवा उपक्रम “चला बोलूया’\nजिल्ह्यामध्ये “भटक्‍या कुत्र्यांची’ दहशत\nबेरोजगार अभियंत्यांना मिळणार कंत्राटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://swarnim-sakhi.blogspot.com/2011/10/blog-post.html", "date_download": "2018-08-18T08:17:34Z", "digest": "sha1:372HB56IHN3PMQG3QT7LBDHOUXHUGUK6", "length": 14979, "nlines": 190, "source_domain": "swarnim-sakhi.blogspot.com", "title": "Swarnim Sakhi...: कोजागिरी पौर्णिमा", "raw_content": "\n\"को जागर्ति ... को जागर्ति \" असे विचारत येणाऱ्या लक्ष्मीची पाऊले हलकेच आभाळभर रेखून जातात चांदण्यांची नक्षी... अन काळोख भरल्या मनाला एक नवीन उमेद ... नव्या स्वप्नाची.. नव्या दिवसाची ..नव्या वर्षाच्या समृद्ध भविष्याची ... लक्ष्मीची चंचल पाऊले ऐकायला जागे राहणाऱ्या आशादायी मनुजाची ...\nपूर्ण चंद्राचे कौतुक आणि उत्सव चांदण्यांचा ...\nमोत्यासारख्या लख्ख प्रकाशात न्हायलेल्या रातीचा...\nकुटुंबीय, आप्त अन मित्रांसोबत हसत खेळत गप्पा मारत केलेल्या जागरणाचा ...\nशुभ्र चांदण्यात चंद्राला दाखवलेल्या दुधाच्या नैवेद्याचा ..\nआणि सगळ्यांसोबत घालवलेल्या या तास दोन तासाच्या मैफिलीचा ....\nसोबत सुरेल आठवणीतल्या कवितांची ... भेंड्या लाऊन म्हटलेल्या चांदण्या रात्रीच्या गाण्यांची ..\nपेटी वरल्या एखाद्या सुरावटीची अन ... उत्स्फूर्त अश्या टाळ्यांची सुद्धा...\nपण.. अशी ही पहिलीच कोजागिरी नाही का...\nदूर... एकांतात... आपल्या माणसांपासून दूर वेगळ्याच शहरात ...\nआपल्याच आभाळात फुलून आलेल्या या पूर्ण चंद्राचे ..शरद पौर्णिमेचे कौतुक फक्त मनातल्या मनात...\nआभाळ तेच... चांदणे तेच... चंद्र ही तोच... अन पौर्णिमा ही तीच..\nपण घर... आपली गच्ची... आपली माणसे... अन कोजागिरीचा सोहळा ... हे सगळेच दूर...\nफोन वर शुभेच्छा देता घेताना... वरकरणी हसून एखादा smily वाक्यात पेरताना ... स्वत:ला समजावणीचा सूर स्वत:चाच...\nपण अंतर्यामी कोजागिरीची साद का अपूर्ण... का मनातल्या भावनांचे सावट या शुभ्र चांदण्यावर ही पडलेले..\nहम तो है परदेस मे ...देस मे निकला होगा चांद...\nअपने रात की छत पर कितना तनहा होगा चांद... \nशब्दसुरांच्या चांदण्याची अशी बरसात करून..कालच काळाच्या पुढे निघून गेलेले जगजीतजी यांची आठवण आल्याशिवाय ही रात्र सरत नाहीये.. गीत - गझलांची ही कोजागिरी मात्र पुढच्या कित्येक पिढ्यांवर अशीच बरसत राहील हे नक्की..\nहम तो है परदेस मे ...देस मे निकला होगा चांद...\nLabels: तुमचे सुद्धा होते का असेच, श्रद्धांजली\nचांद बिना हर दिन यु बीता जैसे युग बीते\nमेरे बीना कीस हाल मी होगा कैसा होगा चांद\nअसं जगजीत आधीच विचारून गेला ,\nआणि उत्तर पण त्यानेच दिलंय\nअपनी रातकी छत पर कितना तनहा होगा चांद\nतर आता असाच जगजीत विना \"तनहा\" असलेला ........\nअक्षय न योग... धन्यवाद ... \nतनहा चांद... हम्म खरेच ओम ...\nबहुत अच्छा लग रहा है...\nचंद्र पण हसत असेल जी पोस्ट वाचून... म्हणेल, काय राव भक्ती इतकी दिवस मी एकला होतो इथे, आता तू तिथे एकली... पण म्हणून काय तो नैवेद्य दाखवणारे का तुला, कोजागिरीचा\nपोस्ट च्या सुरवातीलाच काय माहित का पण जगजीतची आठवण छू गयी... तुझ्या कडे जगजितच्या आठवणी तरी आहेत तो चंद्र बिचारा अजूनही 'तनहा'च आहे... मग त्यास काय देस आणि काय परदेस\nअन तनहा चंद्र... हे खरेच... सोबत करतो ती मात्र मोलाची\nधन्यवाद स्वानंद, मिलिंदजी अन श्रिया ...\nलोभ असाच कायम असू द्यावा \n अन इथे सख्य असेल ते जे जे उत्तम उदात्त सुंदर अश्या सारया हृद्य गोष्टींचे .. कविता... लेख... पुस्तक.. फोटो .. रंग ... रेषा... उकार ..वेलांट्या.. जगण्यातल्या चिमुकल्या क्षणांचे .. मनस्वी नात्यांच्या इंद्रधनुषी गोफांचे.. लडीवाळपणे भवती भवती फेर धरणारया आठवणींचे ... अन अंतरी कस्तुरी सारख्या दरवळणारया मैत्रीचे ... किंवा अगदी पायी टोचणारया काट्याचे .. नि पदर ओढत ओरखडे देणाऱ्या निवडुंगाचे सुद्धा .. या सारया गोष्टींचे सख्य आहे.. म्हणून सखी आहे ...\nरोज की तरह आ गयी वो... रोज की तरह बच्चा देखता रहा अपनी भूरी आँखे भरके... हाथ उठाये ... दिल भरमाये ... रोज की तरह ... फिर एक बार आस लगा...\nपावसात भिजलेले तन मन माझे उगीचच रुसण्याचे बहाणे हे तुझे क्षणार्धात विरतील दुराव्याचे ढग एकदाच परतुनी माझ्याकडे बघ ... ...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ७\nदिवस सातवा हाही दिवस असाच पहाटे उठतो... आधी गणपतीची रूप डोळ्यात रेखून... मग बाकी काम चालू करतो.. सकाळीच पूजा, आरती करून शेजारया...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग 5\nदिवस पाचवा.. हा दिवस गाजवत येतो तयारी हरतालिकेची अन गणपतीची .. सुरु होतो तोच वाजत गाजत .. पुन्हा एकदा वारी बाजाराची... तयारी हरतालिकेच...\nA Walk In Cloud.... गत वर्षीची कोजागिरी अशी जगजीत सिंगजींच्या गझलेत चिंब भिजलेली होती... \"हाथ छुटे भी तो रिश्ते नाही तोडा करते\" ...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ३\nदिवस तिसरा हा दिवस शुभ्र सकाळचा... किलबिल पक्ष्यांच्या आवाजाने जागा होणारा... शेजारच्या गोठ्यातल्या गाईच्या घुंगुरवाळा आवाजाचा... ...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ४\nदिवस चौथा हा दिवस तसा आरामाचा... सुशेगात उठण्याचा... कामाची घाई विसरून चहा पार्टी करण्याचा.. तळ्याच्या काठावर बसून शांत...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ६\nदिवस सहावा... अन मग हा उत्सवी दिवस उजाडतो भल्या पहाटेच... मूर्ती स्थानापन्न होते सजवलेल्या माटीच्या मखरात...मागे रंगवलेले चित्र आत...\nपदर ... नक्षीदार पदर ... रेशमी साडीचा...बुट्टीदार काठाचा .. जरतारीच्या मोराचा वयात येताना आपसूकच चापून-चोपून खांद्यावर विसावलेला... सौभ...\nहृद्य वाचकगण - Followers\nकविता (27) तुमचे सुद्धा होते का असेच (14) सखी (10) मैं (9) भक्ती (3) गोकुळ (2) होकार (2) निळा शाम (1) निळाई (1) भूल (1)\nशेअर विथ केअर :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://puputupu.in/tag/peshwa-assets/", "date_download": "2018-08-18T08:03:33Z", "digest": "sha1:U53LDZSOSUPCNGQDTCR4SKIWMJC6GOOC", "length": 7414, "nlines": 113, "source_domain": "puputupu.in", "title": "Peshwa assets Archives - PupuTupu.in | PupuTupu.in", "raw_content": "\nअबब…अमेरिकेला विकत घेण्याइतकी पेशव्यांकडे संपत्ती\nसध्या उन्नावमध्ये खजिन्याचा शोध सुरू आहे. मात्र या खजिन्यात कुणाची संपत्ती आहे य़ाबाबत जोरदार वादविवाद सुरू आहेत. हा खजिना नानासाहेब पेशव्यांचा असल्याचा दावा अनेक इतिहासतज्ञ करत आहेत. याच पार्श्वभूमीवर पेशव्यांच्या खजिन्याच्या तपशीलाचा शोध लागलाय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.\n५१ हजार ४०२ हिरे ,\n१ लाख , ७६ हजार , ०११ मोती\nनीलम , पुष्कराज , पोवळी , लसन्या आणि हजारो जड जवाहीरे. अबब…ही संपती ५०० लाख कोटींपेक्षा जास्त आहे. या संपत्तीतून अमेरिकेला विकत घेतले जाऊ शकते.\nही संपत्ती आहे एकेकाळी दिल्लीचे तख्त गाजवणा-या पेशव्यांची. यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र ही संपत्ती पेशव्यांचीच असल्याचा पुरावा इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे यांना नुकताच शोधलाय. पुरालेखागार विभागामध्ये मिळालेल्या या कागदपत्रांमधील उल्लेखावरून पेशव्यांच्या श्रीमतीची आपल्याला प्रचिती येते.\nया रत्नांची आत्ताची किंमत ५०० लाख कोटी इतकी असल्याचं दावा इतिहास तज्ज्ञांचा आहे. उन्नाव इथे पुरातत्व खात्याच्या वतीन सुरु असलेला खजिना नक्की कोणाच्या मालकीचा अशी उत्सुकता सर्वानाच आहे. याच पार्श्वभूमीवर पेशव्यांच्या मुख्य खजिन्यातल्या संपत्तीच्या तपशील मिळालाय. पेशव्यांच्या खजिन्यातील केवळ या जड-जवाहिरांची किंमत ५०० लाख कोटींपेक्षा जास्त आहे. मुख्य म्हणजे शनिवारवाड्याची ही श्रीमंती पद्मनाभ मंदिरात आढळलेल्या संपत्तीहून किती तरी जास्त आहे.\nइंग्रजांनी १८१७ साली या खजिन्याची लूट केली होती. ही लुट झाल्या नंतरही या खजिन्यातली काही संपत्ती बाजीराव पेशव्यांनी आपल्यासोबत कानपूरला नेला होता. तो नंतर नानासाहेब यांना प्राप्त झाला. १८५७ च्या युद्धात नानासाहेब यांच्या शोधात असणा-या इंग्रजांच्या हातात पुन्हा एकदा नानासाहेबांचा खजिना पडला… लुट केलेल्या या खजिन्याची किंमत १ कोटी असल्याची नोंद इंग्रजांनी केली आहे.\nआजच्या काळात याची किंमत ५०० कोटी रुपये आहे. पेशव्यांच्या काळात एका राजाकडे एवढी संपत्ती होती यातूनच आपल्याला पेशावाईची श्रीमंती दिसून येते. पेशव्यांच्या या खजिन्याची लूट झाल्यानंतर ती संपत्ती कुठे आहे हे अजूनही गुढच आहे. परंतु पेशव्यांच्या या खाजिन्यामुळेच इंग्रज वैभवशाली झाल्याचं इतिहासकारांचं म्हणणं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2018-08-18T09:00:32Z", "digest": "sha1:WALGVR4L34EM25XBGLGMGBB2ADA5E4SQ", "length": 14112, "nlines": 352, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जमैका - विकिपीडिया", "raw_content": "\nजमैकाचे राष्ट्रकुलचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) किंग्स्टन\nसरकार एकाधिकारशाही व सांसदीय लोकशाही\n- राष्ट्रप्रमुख राणी एलिझाबेथ\n- पंतप्रधान पोर्टिया सिम्पसन-मिलर\n- स्वातंत्र्य दिवस ६ ऑगस्ट १९६२ (युनायटेड किंग्डमपासून)\n- एकूण १०,९९१ किमी२ (१६६वा क्रमांक)\n- पाणी (%) १.५\n-एकूण २८,८९,१८७ (१३९वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण २४.७५० अब्ज अमेरिकन डॉलर\n- वार्षिक दरडोई उत्पन्न ९,०२९ अमेरिकन डॉलर\nमानवी विकास निर्देशांक (२०१०) ▲ ०.६८८ (उच्च) (८० वा)\nराष्ट्रीय चलन जमैकन डॉलर\nआंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी - ५:००\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक १-८७६\nजमैकाचे राष्ट्रकुल हा कॅरिबियनच्या ग्रेटर अँटिल्स भौगोलिक प्रदेशामधील एक लहान द्वीप देश आहे. जमैका कॅरिबियन समुद्रामध्ये क्युबाच्या १४५ किमी दक्षिणेस व हिस्पॅनियोलाच्या १८१ किमी पश्चिमेस वसला असून तो कॅरिबियनमधील पाचव्या क्रमांकाचा मोठा देश आहे. आहे. २०१२ साली सुमारे २९ लाख लोकसंख्या असलेला जमैका ह्या बाबतीत अमेरिका व कॅनडा खालोखाल अमेरिका खंडामधील तिसऱ्या क्रमांकाचा इंग्लिश भाषिक देश आहे. किंग्स्टन ही जमैकाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\n१६५५ सालापासून ब्रिटिश वसाहत असलेल्या जमैकाला ६ ऑगस्ट १९६२ रोजी स्वातंत्र्य मिळाले. सध्या जमैका राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असून येथे युनायटेड किंग्डमच्या राणीची औपचारिक सत्ता आहे.\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघ\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nविकिव्हॉयेज वरील जमैका पर्यटन गाईड (इंग्रजी)\nबर्म्युडा (युनायटेड किंग्डम) • कॅनडा • अमेरिका • ग्रीनलँड (डेन्मार्क) • मेक्सिको • सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स)\nबेलीझ • कोस्टा रिका • ग्वातेमाला • होन्डुरास • निकाराग्वा • पनामा • एल साल्व्हाडोर\nअँग्विला (युनायटेड किंग्डम) • अँटिगा आणि बार्बुडा • अरूबा (नेदरलँड्स) • बहामास • बार्बाडोस • केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • क्युबा • कुरसावो (नेदरलँड्स) • डॉमिनिकन प्रजासत्ताक • डॉमिनिका • ग्रेनेडा • ग्वादेलोप (फ्रान्स) • हैती • जमैका • मार्टिनिक (फ्रान्स) • माँटसेराट (युनायटेड किंग्डम) • नव्हासा द्वीप (अमेरिका) • पोर्तो रिको (अमेरिका) • सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) • सेंट किट्स आणि नेव्हिस • सेंट मार्टिन (फ्रान्स) • सिंट मार्टेन (नेदरलँड्स) • सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • सेंट लुसिया • त्रिनिदाद व टोबॅगो • टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) • ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम)\nआर्जेन्टिना • बोलिव्हिया • ब्राझील • चिली • कोलंबिया • इक्वेडोर • साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • गयाना • फ्रेंच गयाना (फ्रान्स) • फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • पेराग्वे • पेरू • सुरिनाम • उरुग्वे • व्हेनेझुएला\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१६ रोजी ०९:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-saptrang/greenery-in-office-114090500019_1.html", "date_download": "2018-08-18T09:11:53Z", "digest": "sha1:F6V4KIL57LURBES2HS45UIGSNBD5INUP", "length": 8311, "nlines": 108, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ऑफिसमध्ये हिरवाई असल्यास अनुकूल परिणाम | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nऑफिसमध्ये हिरवाई असल्यास अनुकूल परिणाम\nजर ऑफिसमध्ये हिरवाई असेल तर कर्मचार्‍यांचा काम करण्याचा वेग आणि उत्पादकता वाढते, असे दिसून आले आहे. याबाबत कार्डिफ युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी संशोधन केले असून, त्यांच्या म्हणण्यानुसार अशा हिरवाईमुळे कर्मचार्‍यांचा उत्पादकतेमध्ये 15 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.\nसंशोधकांनी तीन महिने हॉलंड आणि ब्रिटनच्या दोन बड्या कंपन्यांमध्ये संशोधन करून या बाबतचे निष्कर्ष काढले आहेत. दोन्ही कंपन्यांच्या ऑफिसमध्ये पुरेशा प्रमाणात झाडे-झुडपे ठेवण्यात आली. तीन महिन्यानंतर असे दिसून आले की, त्याचा अत्यंत अनुकूल असा परिणाम झालेला आहे. कर्मचारी आपल्या कामामध्ये अधिक संतुष्ट असून, ते पूर्वीपेक्षाही अधिक एकाग्रतेने व उत्साहाने ऑफिसचे काम करीत आहेत. शिवाय अशा झाडा-झुडपांमुळे इमारतीमधील प्रदूषण, धूळ आणि किटकांचे प्रमाण कमी होण्यासही मदत मिळते. त्यामुळे वातावरण अधिक स्वच्छ आणि निरोगी होते. त्याचा परिणाम कर्मचार्‍यांच्या आरोग्यावर होतो. अशा हिरवाईमुळे कर्मचारी आजारी पडण्याचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसून झाले.\nRansomware attack: तिरूपती मंदिरावर सायबर हल्ला\nHealth Tips : हिप्सची चरबी कमी करण्यासाठी आलं\nHealth Tips : आपल्या घरी आहे का हे औषधे\nरोज सकाळी रिकामी पोटी घ्या हा ज्यूस आणि फिट ठेवा पोट व किडनी\nयावर अधिक वाचा :\nअटलजींच्या प्रेमामुळे राजकारणात आलो\nअटलजींचे माझ्यावर खूप प्रेम होते. अधूनमधून ते माझ्याशी राजकीय विषयांवर गप्पा मारायचे. ...\nशांतीचा दूत म्हणून पाकिस्तानात : सिद्धू\nभारत आणि पाकिस्तानमधील प्रेम आणि शांतीचा सद्‌भावना दूत म्हणून मी पाकिस्तानला जात असून ...\nकेरळ पूर: 324 बळी\nकेरळमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. येथे 100 वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती ...\nपाकच पंतप्रधानपदाची इम्रान खान घेणार आज शपथ\nपीटीआय पक्षाचे प्रुख इ्रान खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून आज शनिवारी शपथ घेणार आहेत. ...\nआता कावळे करणार साफसफाई\nफ्रान्समधील प्यू ड्यू फोयू या ऐतिहासिक पार्कमध्ये सध्या कावळ्यांना कचरा उचलण्याचं ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/rainy-season-bay-of-bengal-farmer/", "date_download": "2018-08-18T07:59:19Z", "digest": "sha1:G7LVV2YXPYMRSJO4A4S4EVRZR66D564Y", "length": 7454, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाऊस परतण्याचा सांगावा… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे – पंधरवड्यापासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे पुनरागमन होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यामुळे राज्यात पाऊस पडेल, असा अंदाज आहे.\nगेले दहा ते पंधरा दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. पावसाची ही उघडीप आता संपण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सध्या बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्‍चिम बंगाल परिसरात कार्यरत होणार आहे. या क्षेत्राची तीव्रता सोमवार ते गुरुवारदरम्यान वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मध्य भारतासह पश्‍चिम किनारपट्टीत पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\nसध्या उत्तरेकडील राज्यांमध्ये मान्सून सक्रिय आहे. गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीसह बिहार, पश्‍चिम बंगालमध्ये चांगला पाऊस बरसत आहे. यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, शनिवारपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस झाला आहे. तर, घाटमाथ्यावरही पावसाला सुरूवात झाली आहे. पुण्यात शनिवारी पावसाच्या सरी बरसल्या. पण, रविवारी पुन्हा विश्रांती घेतली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n कसोटी क्रमवारीत मिळवले अव्वलस्थान\nNext articleराष्ट्रीयत्व सिद्ध करा, अन्यथा माघारी जा: रमण सिंह\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले अटलजींच्या पार्थिवाचे दर्शन\nसारथी उपक्रमातून 5 लाख लोकांचे शंका निरसन\nपुणे – दोनशेहून अधिक जणांकडून दावे दाखल\n“भुक मुक्त’ पुण्यासाठी स्मार्ट सिटीचा पुढाकार\nकचरा प्रकल्पांची क्षमता वाढवा\n24 तासांमध्ये मिळणार वीजग्राहकांना संपूर्ण माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.manashakti.org/index.php?q=story/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2018-08-18T09:21:40Z", "digest": "sha1:DDKR2IM6PC5LFFGCUHGWRMBXEMED2FGH", "length": 6592, "nlines": 93, "source_domain": "www.manashakti.org", "title": "गुरूवारचा दत्तप्रसाद | Manashakti Research Centre", "raw_content": "\nयेथे सातत्यपूर्ण मनःशांती मिळवण्याच्या सोप्या व व्यावहारीक उपायांची माहिती आहे.\nHome » Weekly Story » गुरूवारचा दत्तप्रसाद\nगुरूला पृथ्वीवर मोठा मान आहे. ही माहिती नारदानं सांगितली तेव्हा, अवाढव्य गुरू खूष होऊन गेला. ज्याच्या त्याच्या शक्तीचं साफल्या पाहिलेलं ज्याला त्याला आवडतंच.\nपण बुध गमतीनं म्हणाला, “मोठ्यांचा मान आणि छोट्यांना लाथ, ही माणसाची रीतच आहे. रोज उपयोगी पडणारं गुरू लाथा मारत गोठ्यात बांधायचं, आणि भल्या मोठ्या दिसणाऱ्या गुरूपुढे थरथर कापत, त्याला भ्यायचं. यापेक्षा भित्री माणसं, दुसरं काय करणार\nआकारानं सगळ्यात लहान असलेला बुध निंदा करतो आहे की काय, अशा आशंकेनं गुरू बुधाकडे डोळे मिचकावून पाहू लागला. पण तेवढ्यात नारदांनी त्याच्याबद्दलचं आगमसारात असणारं वर्णन आणि स्तुतीमंत्र सांगितला,\n“गकार: सिध्दिद: प्रोक्तो रेफ: पापस्य हारक:\nउकारो विष्णुख्यक्तस्त्रितयात्मा गुरू पर:\n(अर्थ - गुरू शब्दातला गकार हा सिध्दी देणारा, रकार हा पापहारक व उकार हा अव्यक्त विष्णू आहे. एवंच गुरू हा वरील तिन्ही गोष्टींचा समावेश असलेला व श्रेष्ठ आहे.)\nगुरूनं बुधाला समजावलं, “मी आकारानं मोठा आहे म्हणून स्वत:ला मोठा मानत नाही. माझ्या वारी दत्ताला मोठेपण मी आपण होऊन दिलं आहे. दत्त म्हणजे देणारा. स्वत: लंगोटीभर वस्त्र लावून, क्षुद्र वस्तूतसुध्दा चोवीस गुरू शोधणारा, असा त्यागी, गुणवान आदर्श पूजावा, म्हणजे माणसाचं कल्याण होइले, असंच मला वाटतं.”\nनारदानी माहिती पुरवली, “मुसलमान लोकसुध्दा गुरूवारला शुभ मानतात. मूल गुरूवारी जन्मलं तर ते यशवान समजात. त्याला ‘जुमान राती सय्यद’समजात. “\nबुध गुरूच्या पायाला गुदगुल्या करून म्हणाला, “उगीच तुझ्या पायाला गंमत केली रे. दत्तासारख्या त्यागी चेतनाला मोठं केल्यामुळे तू मोठा झाला आहेस, हे मला काही समजत नाही का मी तुझ्याजवळ आहे. दूर दूर असलेल्या माणसांनी खोट्या आणि सोप्या गुरूकृपेबद्दल भलते ग्रहे करून घ्यायचे आणि आपल्यासारख्याच्याबद्दल विक्षिप्त ‘ग्रह’ बनवायचे, यात आपली चूक काय आहे मी तुझ्याजवळ आहे. दूर दूर असलेल्या माणसांनी खोट्या आणि सोप्या गुरूकृपेबद्दल भलते ग्रहे करून घ्यायचे आणि आपल्यासारख्याच्याबद्दल विक्षिप्त ‘ग्रह’ बनवायचे, यात आपली चूक काय आहे या माणसांना शहाणं कोण करणार या माणसांना शहाणं कोण करणार\n“तेच करण्याचा माझा नम्र प्रयत्न आहे. “नारद उठून उभे राहण्याच्या पवित्र्यात म्हणाले. पण सगळ्याच ग्रहांनी केलेल्या आग्रहानं; पृथ्वीवर जाण्यापूर्वी थोडावेळ बसायचं,म्हणून पुन्हा बसले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://sanvaad.blogspot.com/2011/09/blog-post_20.html", "date_download": "2018-08-18T08:36:01Z", "digest": "sha1:NWZBA7FORJ4QJ7ZU6LLMQ7GTB3G2POHG", "length": 24594, "nlines": 135, "source_domain": "sanvaad.blogspot.com", "title": "संवाद: प्रवासाच्या सुरस कथा- २", "raw_content": "\nमाझ्या मनातला सातत्याने चाललेला विचारांचा प्रवास...माझ्यातल्या चाकोरीबाहेरच्या नव्या जाणिवा, नव्या सृजनाची जाण...त्याची अभिव्यक्ति म्हणजेच हा संवाद...मर्मबंधातली ठेव ही\nप्रवासाच्या सुरस कथा- २\nदिल्लीवाल्या कलीगने सांगितलेलं की ठेशनावर उतरुन बावळटासारखी इथे तिथे बघू नकोस. चेहर्‍यावर एक माज, बेदरकारपणा आणून वावर. जमेल का थोडी इथेच प्रॅक्टीस कर, वगैरे. थोडक्यात त्याला म्हणायचं होतं की इतरांकडे तुच्छ कटाक्ष टाकत वावरायचं. काय कॉन्फिडन्स थोडी इथेच प्रॅक्टीस कर, वगैरे. थोडक्यात त्याला म्हणायचं होतं की इतरांकडे तुच्छ कटाक्ष टाकत वावरायचं. काय कॉन्फिडन्स कलीगचा हो, माझ्याविषयी म्हंजे मला झेपणार नाही, हा. अधिक स्पष्ट बोलायचे तर, मी बावळट(च) वाटेन, हा. पण इतकी काय मी अगदीच हे नाहीय्ये हां. त्याला काय बोलायला अल्पनानेही प्रीपेड टॅक्सी किंवा रिक्षा करायचा सल्ला दिला होताच. कलीगनेही. तर ह्या सर्वांचा सल्ला शिरोधार्य मानून सरळ बाहेर पडले तुच्छ कटाक्ष वगैरे टाकत, तिथलीच असल्यासारखी, स्वातीला सोबत घेऊन. तरी आमचा नवखेपणा रिक्षावाल्यांना आणि टॅक्सीवाल्यांना कसा काय उमजला त्यांनाच ठाऊक, आणि प्रत्येक गावा, शहरात असं कसं घडतं, हेही मला आजतागायत समजलेलं नाही, म्हणजे माझ्याच असं नाही, तर प्रत्येकाच्या बाबतीत. अशा बर्‍याच कथा कहाण्या ऐकल्या आहेत. तुच्छ कटाक्ष पुरेश्या तुच्छपणे टाकायचे राहिले असावेत.\nमधमाशांचा थवा यावा तसे सगळे आपले भेनजी, किदर जाना हय वगैरे करत आले. स्वाती सगळ्यांना काय काय उत्तरं देत होती. मी थक्क अगं चल, म्हणत तिलाही प्रीपेड बूथवर घेऊन आले. तिथेही टॅक्सी आणि रि़क्षावाल्यांचा इतका माज, वैताग होता, खरंच. इतक्या मोठ्या थव्याने सभोवताली गर्दी केली की मला बूथपरेंतही जाता येईना अगं चल, म्हणत तिलाही प्रीपेड बूथवर घेऊन आले. तिथेही टॅक्सी आणि रि़क्षावाल्यांचा इतका माज, वैताग होता, खरंच. इतक्या मोठ्या थव्याने सभोवताली गर्दी केली की मला बूथपरेंतही जाता येईना आत काउंटरवर बसलेला माणूस बाहेर येऊन सक्काळी सक्काळी सगळ्यांना खास दिल्लीवाल्या शिव्या घालून पुन्हा आत बसायला गेला. दोन गोष्टी घडल्या, एक, ह्या लोकांना काहीही फरक पडला नाही. दोन, माझी शब्दसंपदा वाढलेली आहे. आता मात्र जरा डोक्यावरुन पाणी चाललं होतं, मग मात्र व्यवस्थित झापलंच जरासं आणि लगेच काम झालं. निदान बूथपाशी जाऊन रिक्षा बुक करता आली, रस्ता दिला सगळ्यांनी. मर्‍हाठी पाणी हो शेवटी. असो, असो.\nरिक्षा घेऊन अल्पनाकडे निघालो. तिला आणि तिच्या कुटुंबियांना प्रथमच भेटणार होतो. उत्सुकता होती.\nदिल्लीचा दर्शनी भाग, जिथे राजकीय कार्यालयं आहेत, तो देखणा आहे, ह्याची जाणीव झाली. मोठे, सरळ, सुरेख रस्ते, बिनखड्ड्याचे रस्ते. झाडी. चालणारे ट्रॅफिक सिग्नल्स, सहसा ते पाळणारे लोक. क्वचित एखादा गाडीचालक बेदरकारपणे नियम धुडकावून जात होता. जाता जाता रिक्षा एका वळणावर आली आणि समोर एकदम अमर ज्योतीचं दर्शन झालं.\nरिक्षातच होतो, आणि रिक्षा बघता बघता पुढेही गेली खरी, पण त्या एका क्षणामध्ये ती ज्योती, ती बंदूक आणि हेल्मेट पाहून जे काय वाटलं ते शब्दातीत आहे बघता बघता डोळ्यांत पाणी आणि घशात हुंदका कधी दाटला हे समजलं नाही. रिक्षावाल्याला रिक्षा थांबव सांगून मी ज्योतीचं दर्शन घ्यायला अणि फोटो काढायला जाणार होते, पण शब्दच फुटेना तोंडातून. हे सगळं घडलं काही दोन पाच क्षणातच, रिक्षा खूप लांब गेली, पण सकाळच्या धुक्यातली तेजाळ अमर ज्योती कधी विसरेन असं वाटत नाही. आपल्याच शहीद सैनिकांची आठवण देणारी ती ज्योती आहे, खरं तर मशाल आहे, सतत धगधगणारी. कोण कुठले सामान्य लोक, जिगर बाळगतात, कठीणातलं कठीण प्रशिक्षण पूर्ण करुन सैन्यात शिरतात, अख्ख्या देशाची सरहद सांभाळतात. प्रसंगी जीवाचं मोल देतात. आपल्या घरच्यांपासून महिनोंमहिने दूर राहतात, सगळ्या काळज्या, चिंता, त्यापायी होणारा त्रास, आठवणी, कदाचित कधी पूर्ण न होणारी स्वप्न, साध्या साध्या इच्छा, बहुधा घरच्यांना वेळ देता येत नाही ह्याबद्द्लची खंत, हे असं सगळं आणि अजूनही बरचंस काही मनातल्या मनात कुठेतरी लपवून जराही कुचराई न करता आणि पुन्हा कोणत्याही क्षणी आपला जीव जाऊ शकतो ही शक्यता माहीत असतानाही, जीवावर उदार होऊन आपलं काम चोख करायचं ही मला तरी साधीसुधी गोष्ट वाटत नाही, मग भले कोणी सेंटीमेंटल वगैरे म्हणालात तर म्हणा. मेरी बलासे. त्यांच्या जीवावर मी स्वतंत्र भारतात जगते. ज्या गोळीवर त्यांचं नाव लिहिलेलं असतं ती येऊन शरीरात आदळली की शेवटच्या त्या क्षणी त्यांच्या मनात काय येत असेल बघता बघता डोळ्यांत पाणी आणि घशात हुंदका कधी दाटला हे समजलं नाही. रिक्षावाल्याला रिक्षा थांबव सांगून मी ज्योतीचं दर्शन घ्यायला अणि फोटो काढायला जाणार होते, पण शब्दच फुटेना तोंडातून. हे सगळं घडलं काही दोन पाच क्षणातच, रिक्षा खूप लांब गेली, पण सकाळच्या धुक्यातली तेजाळ अमर ज्योती कधी विसरेन असं वाटत नाही. आपल्याच शहीद सैनिकांची आठवण देणारी ती ज्योती आहे, खरं तर मशाल आहे, सतत धगधगणारी. कोण कुठले सामान्य लोक, जिगर बाळगतात, कठीणातलं कठीण प्रशिक्षण पूर्ण करुन सैन्यात शिरतात, अख्ख्या देशाची सरहद सांभाळतात. प्रसंगी जीवाचं मोल देतात. आपल्या घरच्यांपासून महिनोंमहिने दूर राहतात, सगळ्या काळज्या, चिंता, त्यापायी होणारा त्रास, आठवणी, कदाचित कधी पूर्ण न होणारी स्वप्न, साध्या साध्या इच्छा, बहुधा घरच्यांना वेळ देता येत नाही ह्याबद्द्लची खंत, हे असं सगळं आणि अजूनही बरचंस काही मनातल्या मनात कुठेतरी लपवून जराही कुचराई न करता आणि पुन्हा कोणत्याही क्षणी आपला जीव जाऊ शकतो ही शक्यता माहीत असतानाही, जीवावर उदार होऊन आपलं काम चोख करायचं ही मला तरी साधीसुधी गोष्ट वाटत नाही, मग भले कोणी सेंटीमेंटल वगैरे म्हणालात तर म्हणा. मेरी बलासे. त्यांच्या जीवावर मी स्वतंत्र भारतात जगते. ज्या गोळीवर त्यांचं नाव लिहिलेलं असतं ती येऊन शरीरात आदळली की शेवटच्या त्या क्षणी त्यांच्या मनात काय येत असेल येत असेल की काही समजण्याच्या पलिकडे क्षणार्धात पोचता येत असेल ज्या कोणाची कारकीर्द गोळी न खाता संपत असेल, त्यांच्या मनामध्ये कधीतरी गोळी खावी लागेल, हे दडपण कुठेतरी आयुष्यभरासाठी दबा धरुन बसून रहात असेल का ज्या कोणाची कारकीर्द गोळी न खाता संपत असेल, त्यांच्या मनामध्ये कधीतरी गोळी खावी लागेल, हे दडपण कुठेतरी आयुष्यभरासाठी दबा धरुन बसून रहात असेल का त्याचा एकूणच जगण्यावर कसा आणि कितपत परिणाम होत असेल त्याचा एकूणच जगण्यावर कसा आणि कितपत परिणाम होत असेल हे दडपण संपल्यावर काय वाटत असेल हे दडपण संपल्यावर काय वाटत असेल रितेपणा\nही नोकरी आणि त्यापायी येणार्‍या जबाबदार्‍या, ताणही त्याबरोबर येणारच, त्यात इतकं काय इतकं, वगैरे बुद्धीवादी युक्तीवादही मी ऐकले वाचले आहेत. असं बोलणार्‍यांची, विचार करणार्‍यांची मला आता कीव येते. आधी खूप राग यायचा. नोकरी आहे वगैरे सगळं ठीके हो, पण तरीही मला कौतुक आहे आणि आदरही आहे. काही बाबतींत मी कमालीची सेंटीमेंटल आणि इमोसनल वगैरे वगैरे जे काय असतं ते सगळं आहे. असूद्यात. आपल्याकडे - म्हंजे माझ्याचकडे त्येवडंच हाये.ज्याचा त्याचा नजरिया. असो. पुढे चाललो होतो...\nदिल्लीचा हा बाहेरचा दर्शनी भाग जसा बाजूला पडला तसं दिल्ली शहर एकदम दिल्ली गाँव वाटायला लागलं. ए़कदम गाँवकी मिट्टीकी याद, सौंधी सौंधी खुशबू वगैरे. एकदम घरेलू दिसायला लागली दिल्ली. बघता, बघता अल्पनाचं घर आलं, अल्पना बाहेरच उभी होती आमच्यासाठी. तिच्या कुटुंबियांनीही फार अगत्याने आगत स्वागत केलं. आम्ही तिच्या घरात घुसून हक्काने सॅक्स तिथेच बैठकीच्या खोलीतच आपटल्या. पसारा झालाच, पण परक्या ठिकाणी नव्हतोच. पुढच्या प्रवासात आंघोळीच्या पाण्याची चैन वगैरे परवडणारी नव्हती, तेह्वा अल्पनाकडे अगदी चैन करुन घेतली अल्पनाच्या सौजन्याने प्राठे वगैरे खाल्ले. खूप अगत्याने आणि निगुतीने तिने आमची खतिरदारी केली. खूप खूप कौतुक वाटलं. आयामचा थोडक्या वेळात खूप लळा लागला. तितक्यात रैनाही येऊन पोचली होती आणि रिक्षावाल्याने तिला व्यवस्थित गंडवलेलं होतं. जाऊंद्यात झालं, असा विचार केला. कुठे कुठे डोक्याला त्रास द्यायचा हो अल्पनाच्या सौजन्याने प्राठे वगैरे खाल्ले. खूप अगत्याने आणि निगुतीने तिने आमची खतिरदारी केली. खूप खूप कौतुक वाटलं. आयामचा थोडक्या वेळात खूप लळा लागला. तितक्यात रैनाही येऊन पोचली होती आणि रिक्षावाल्याने तिला व्यवस्थित गंडवलेलं होतं. जाऊंद्यात झालं, असा विचार केला. कुठे कुठे डोक्याला त्रास द्यायचा हो चलताय. दुपारी एक वाजता ट्रेकवाला ग्रूप ठेशनजवळच्या हाटेलात पोचणार होता. गप्पा मारता मारता आणि प्राठे खाता खाता तिथे पोहोचायची वेळ झाली आणि आमची सवारी पुन्हा एकदा दिल्ली ठेशनाजवळच्या हाटेलात जाण्यासाठी निघाली. तिथे सगळे जमणार होतो आणि पुढचा प्रवास एकत्र करणार होतो.\nतिथे पोहोचून मग रीतसर ग्रूपशी ओळख वगैरे सोपस्कार पार पडले. सगळ्यांनी ओळख करुन दिली खरी, पण त्यावेळी मला बरीच नावं लक्षातच राहिली नाहीत. तुमचं होतं का असं कधी कळतील पुन्हा हळूहळू, म्हणून मी गप्प बसले, पण मंडळी ट्रेक्स केलेली, अनुभवी दिसत होती, आणि त्याचं मात्र दडपण आलं होतं. भय इथले संपत नाही.. सामान उचललं आणि हरिद्वारला जायच्या ट्रेनीचा पत्ता काढत योग्य प्लॅटफॉर्मवर पोहोचून गाडी आल्यावर आपापल्या जागा पकडून जरा स्थिरावलो. एकूणातच ग्रूपशी जमेल असं वाटायला लागलं, कारण गप्पा आणि टवाळक्या सुरु झाल्याच. दिल खुस हुवी गया कळतील पुन्हा हळूहळू, म्हणून मी गप्प बसले, पण मंडळी ट्रेक्स केलेली, अनुभवी दिसत होती, आणि त्याचं मात्र दडपण आलं होतं. भय इथले संपत नाही.. सामान उचललं आणि हरिद्वारला जायच्या ट्रेनीचा पत्ता काढत योग्य प्लॅटफॉर्मवर पोहोचून गाडी आल्यावर आपापल्या जागा पकडून जरा स्थिरावलो. एकूणातच ग्रूपशी जमेल असं वाटायला लागलं, कारण गप्पा आणि टवाळक्या सुरु झाल्याच. दिल खुस हुवी गया आगाज ये है, तो अंजाम होगा हॅंसी..\nहरिद्वारला जायच्या ट्रेनमध्ये बसलो होतो. त्याआधी ठेसनावरुन दरभंगा गेलेली पाहिली. इतकी ठासलेली माणसं. प्रत्येक डब्यामध्ये अजून एक तरी माणूस अजून चढला तर रेल्वेचा डबा फुटेल अशी परिस्थिती. कठीण आहे गाडी सुटली आणि हळूहळू शहरी भाग मागे टाकून शेती दिसायला सुरुवात झाली. लालसर काळी माती. लांबच लांब, आडवी उभी शेती पसरलेली. पाणथळीच्या जागा. वेगळे वेगळे पक्षी दिसत होते. आणि कसे स्वैर उडत होते, सूर मारत होते... खुशहाल जिंदगी. हेवा, हेवा. माणसाच्या जगातल्या कोणत्याच चिंता नाहीत. सुखी जीव. साहेबांना सगळ्यांची नावे ठाऊक. तेच ते अचंबा प्रकरण पुन्हा एकदा वाटून गेले. आता सगळ्यांच्या गप्पा सुरु. सोबतीला चहा, खाणे वगैरे. मिल बैठे थे सब यार. मध्येच मला उगाच झापड आली. मग, मला गप्पा ऐकायच्यात पण डोळे मिटताहेत, तेह्वा डोळे मिटून ऐकते, सांगून डुलकी वगैरे काढली असावी, कारण मधले फारसे काही आठवत नाहीये. खायच्या वेळी बरोब्बर जाग येत होती मात्र\nहरिद्वारला जायच्या ट्रेनीत बसले होते, तेह्वा एका मैत्रिणीचा फोन आला. स्मिताचा. आम्ही दोघी एकाच शहारात राहून, भेटणं बर्‍याचदा दुरापास्त. तीच ती शहरी घिसीपिटी कारणं. खरीखुरी असली तरी तितकीच वैतागवाणी. आलिया भोगासी टायपाची. तर, तिने फोन केला आणि नेहमीप्रमाणे कुठे आहेस, हा प्रश्न टाकल्यावर हरिद्वारला चाललेय, असं उत्तर ऐकून ती तीही खरोखरची उडाल्याचं मला इथे ट्रेनीत समजलं. मज्जेत हसलोच मग दोघी. मग तिला सगळं सांगितलं ह्या ट्रेकविषयी. गप्पा मारल्या. मी हा ट्रेक करतेय हे ऐकून तिलाच ग्रेट वाटलं होतं, आणि तिचा हा आपलेपणा पाहून, मला.\nगाडी हरिद्वारला पोहोचेपरेंत संध्याकाळ झाली होती. हवेत उष्मा होता. हरिद्वारचं स्टेशन मला आवडलं. बाहेरुन स्टेशनलाही एखाद्या मंदिरासारखा आकार दिलेला, मध्यभागी लायटिंग केलेला चमकणारा ॐ. गंम्मत वाटली, कारण नाही, उगाच आपली वाटली. आवडलं. सामान सुमान घेऊन स्टेशनच्या बाहेर पडलो. भरपूर गर्दी. माणसे पुढल्या गाड्यांची वाट बघत बसली होती, पहुडली होती. बायका साड्या वाळवत होत्या. लोकांचे खाणे वगैरे सुरु होते. माहौल निवांत होता. सगळे गंगामैय्याच्या चरणी आपली पापं, चिंता वगैरे वाहून निवांत असणार. माईच्या कुशीत चिंता कसली तीही सगळं काही स्वीकारुन वाहतेच आहे युगानुयुगे... तिचा तोच धर्म आहे. ठेसनाबाहेरच सामोसे, जिलब्या बनवण्याचे ठेले होते. अजूनही काय काय मिठाया होत्या. काहीच घेतलं नाही पण, एकतर हृषिकेशला पोहोचायचं होतं वेळेत. पुन्हा हरिद्वारला होतो, काहीच नाही तर निदान इतका मोह तरी आवरतो का बघावं, म्हणलं. जमलं तेवढ्यापुरतं तरी. लई झालं, इतकं जमलं तरी खूप आहे.\nठेसनाबाहेर बस घेऊन डायवरबाबा तयार होते. सामान टाकलं आणि हृषिकेशच्या दिशेने निघालो..\nदिल्ली....माझा तिथल्या प्रवासाचा जबर अनुभव आहे. माणूस कसा \"बनतो\" हे मला तिथं नव्यानं शिकायला मिळालं...लिहीन कधी विस्तारानं...\nमजा येतेय. चालु दे\nलिही की लवकर आणि लिकही दे.\nहर हर गंगे.. १\nप्रवासाच्या सुरस कथा- २\nमाझिया मना जरा सांग ना\nप्रतिबिंब - आणि हा ब्लॉग बघणीय पण :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/prakash-ambedkar-fires-away/", "date_download": "2018-08-18T09:15:02Z", "digest": "sha1:BIJMSBI2J6YQV42V624BPJUED6RVRHGY", "length": 7215, "nlines": 141, "source_domain": "www.marathimati.net", "title": "आधी स्वतःचे चारित्र्य निरखून पहा | Prakash Ambedkar Fires Away", "raw_content": "\nआधी स्वतःचे चारित्र्य निरखून पहा\nप्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे\nभारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरे यांच्यावर आरोप केला की, ‘राज ठाकरे यांचा इंदू मिलच्या वक्तव्यावरुन बाबा आंबेडकरांविषयीचा कडवा द्वेष प्रकट झाला आहे.’ ‘राज ठाकरे यांनी स्वतःचे चारित्र्य आधी निरखून पहावे नाहीतर त्यांची पोलखोल करायला फारसा वेळ लागणार नाही,’ असा इशाराही त्यांनी बुधवारी केला.\n‘मनसेने काढलेल्या मोर्चात राज यांचा बौद्ध व मुस्लिम यांच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न आहे. उत्तर प्रदेशातल्या तीन शहरांत कुठेही बुद्ध मूर्तीची विटंबना झाल्याची माहिती आमच्याकडे नाही. त्यामुळे कशाच्या आधारावर राज यांनी माहिती दिली,’ अशा आरोपाबरोबर आंबेडकर यांनी सवालही केला आहे.\nया वर्गातील आणखी काही लेख\nराज ठाकरे यांचे एक पाऊल पुढे\nराज यांनी फोडली महाराष्ट्र धर्माची डरकाळी\nमुख्यमंत्री यांचा नितीशकुमारांना सणसणीत टोला\nमनसेने घातली सूरक्षेत्रवर झडप\nराज ठाकरे भेटले पोलिस आयुक्तांना\nअरुप पटनाईक यांना प्रमोशन\nराज यांनी काढली नगरसेवकांची खरडपट्टी\nगृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायलाच हवा\nमनसे घेणार ठोस भूमिका\nThis entry was posted in घडामोडी and tagged प्रकाश आंबेडकर, बुद्ध, भारिप बहुजन महासंघ, मनसे, राज ठाकरे on ऑगस्ट 23, 2012 by संपादक.\n← अबू आझमींचे राज ठाकरे यांना आव्हान कुटुंब ३१ ऑगस्टला चित्रपटगृहात →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2018-08-18T09:05:36Z", "digest": "sha1:YRSWHUVZICE67VSLIP6PTIBPH53ONBGZ", "length": 3894, "nlines": 64, "source_domain": "m4marathi.com", "title": "असा असावा पेहराव | m4marathi", "raw_content": "\nआपण चांगलं दिसावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्याकरीता चांगला पोषाख करण्याकडे प्रत्येकाचा काळ असतो. प्रसंगानुरूप आपला पोशाख कसा असावा याकरिता काही फायदेशीर माहिती खाली देत आहोत,\n१) लग्न समारंभ, रिसेप्शन, तसेच पारंपरिक कार्यक्रमांनाजाताना गडद रंगाचे, टिकली वर्क, जरी वर्क असलेले कपडे वापरावेत.\n२) आपल्या वयाला शोभतील, असे कपडे घालावेत.\n३) ऑफीस, गेट टू गेदर, मिटिंग, सार्वजनिक कार्यक्रमांनाहजेरी लावणार असाल तर गडद रंग न वापरता हलकेरंगांचे कपडे वापरावेत. एम्ब्रॉडरी, चिकन, लाईट सेल्फकलर वर्क असलेले कपडे वापरावेत.\n४) पिकनिक, हॉटेलिंग, प्रवास करण्यासाठी जात असाल तरतुम्हाला आरामदायी वाटेल, असे कपडे वापरा. जेणे करूनतुम्ही हा वेळ आनंदात घालवू शकाल.\n५) ऑफिसला जाताना शक्यतो सर्व अंग झाकले जाईल. फारघट्ट नसतील व रंग सुद्धा सोबर असतील, असे कपडे वापरावेत.\nसुंदर, नितळ, निरागस डोळ्यांची निगा अशी राखा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B6/", "date_download": "2018-08-18T07:59:47Z", "digest": "sha1:YKPHZ3SVIWKJFZKJWTPSUSPNESLJTBEJ", "length": 13044, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक व्हा’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक व्हा’\nमकरंद टिल्लू यांचे मत : गुरूवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांचा स्मृतिदिन\nपवनानगर – विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक व्हा, विद्यार्थ्यांचा अवघड विषय आपोआप आवडता होईल, असे मत हास्यतज्ज्ञ मकरंद टिल्लू यांनी तळेगाव येथे व्यक्‍त केले. तळेगाव येथील नूतन इंजिनिअंरिग कॉलेजमध्ये नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक चिटणीस गुरूवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांच्या 92 व्या पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मकरंद टिल्लू प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.\nया सभेस अध्यक्षस्थानी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे हे होते. या वेळी व्यासपीठावर माजी आमदार कृष्णराव भेगडे, संस्थेचे सचिव संतोष खांडगे, खजिनदार सुरेशभाई शहा, संस्थेचे माजी अध्यक्ष वसंतराव दादा खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, संस्थेचे संचालक सोनबा गोपाळे, महेशभाई शहा, विनायक अभ्यंकर, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांच्यासह संस्थेचे आजी-माजी मुख्याध्यापक, आजी माजी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.\nया वेळी बोलताना टिल्लू म्हणाले की, शिक्षकांनी नेहमी सकारात्मक असले पाहिजे, कारण सकारात्मक पणामुळे आपले कोणतेही काम सहज होऊ शकते तसेच “प्रत्येकाने जगण्यासाठी हसा व हसण्यासाठी जगा’ या तत्वाचा अवलंब केल्याने माणसाचे आयुष्य वाढते. त्याचप्रमाणे प्रत्येक शिक्षकाने हास्य विनोदाचा वापर शिक्षण पद्धतीत अवलंबविल्यास अध्यापन पद्धती व अध्ययन पद्धती सहज सोपी होईल.\nत्याचप्रमाणे पाणी गळतीवर भाष्य करताना मकरंद टिल्लू म्हणाले की, भविष्यात पाणी संकटाचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागेल, त्यासाठी प्रत्येकाने पाणी बचतीची चळवळ उभी केली पाहिजे, त्यासाठी प्रत्येकाना आपला वाढदिवस साजरा करताना गावातील परिसरातील अथवा आपल्या भागातील गळके व नादुरूस्त नळ दुरूस्त करून साजरा करावा, असे केल्याने मोठी समाजसेवा घडेल, असे त्यांनी सांगितले.\nप्रास्तविकात संस्थेचे सचिव संतोष खांडगे म्हणाले की, भविष्यकाळात संस्थेला चांगले भविष्य असून त्यासाठी नवनवीन शैक्षणिक दालने उभारणे गरजेचे आहे. लवकरच सोशल मीडियाच्या या काळात टिकून राहायचे असेल, तर बदल आवश्‍यक आहे. लवकर संस्थेच्या सर्व शाळा, कॉलेज आयएसओ मानंकन प्राप्त होतील. त्यासाठी तयारीही सुरू झाली आहे, तर संस्थेत स्कील डेव्हलपमेंट सुरू करून अनेकांना रोजगार प्राप्त देण्यासाठी संस्थापतळीवर प्रयत्न सुरू आहेत.\nअध्यक्षीय भाषणात आमदार कृष्णराव भेगडे म्हणाले की, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ या संस्थेला एक ऐतिहासिक वारसा असून स्पर्धेच्या युगात टिकून राहाचे असेल, तर इतरांबरोबर बदल आवश्‍यक आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान शिक्षणाची गरज आहे. महाराष्टात संस्थेचे नावलौकिक होण्यासाठी पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाशी सामंजस्य करार करून संस्थेतील अनेक मोठ्या कंपन्यांशी करार केला. येथे शिक्षण घेणाऱ्या तरूणांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.\nया वेळी यावर्षी गुरूवर्य अण्णासाहेब विजापूरकर शिक्षकेत्तर पुरस्कार पैसाफंड प्राथमिक शाळेतील लिपीक सुविधा नामजोशी यांना प्रदान करण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्कार पवना विद्या मंदिर पवनानगर येथील प्राचार्या प्रीती जंगले यांनी प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळक आदर्श शाळा पुरस्कार इंदोरी येथील प्रगती विद्या मंदिर या शाळेला प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे दहावी व बारावी या शालांत परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.\nसंपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पवना विद्या मंदिर व पवना ज्युनिअर कॉलेज पवनानगर शाळेने केले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे भांडारप्रमुख पांडुरंग पोटे शाळेच्या प्राचार्या प्रीती जंगले, पर्यवेक्षिका निला केसकर यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी केले. सूत्रसंचालन पवना विद्या मंदिराचे अध्यापक भारत काळे व सुवर्णा काळडोके यांनी केले. सोनबा गोपाळे यांनी आभार मानले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘त्याने’ चक्क विमानच चोरले\nNext articleवासुली येथून लोखंडी पत्रे लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.blogspot.com/2016/03/", "date_download": "2018-08-18T09:12:38Z", "digest": "sha1:KMUBHZJ673FRX5QUAPE6WPWGXUQPFCVX", "length": 70429, "nlines": 237, "source_domain": "aisiakshare.blogspot.com", "title": "ऐसी अक्षरे: March 2016", "raw_content": "\nचोहीकडे जयघोष झाला बहोत खूब अन् वाहवा मैफलीत या रंग भरण्या 'मंदार' हा आला पहा...\nध्वनिप्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियम, २००० नुसार विविध परीसरातील आवाजाची कमाल पातळी पुढीलप्रमाणे ठरविण्यात आलेली आहे -\nपरीसर/क्षेत्र प्रकार - ध्वनिमर्यादा (सकाळी ६ ते रात्री १०) - ध्वनिमर्यादा (रात्री १० ते सकाळी ६)\n(अ) औद्योगिक क्षेत्र - ७५ डेसिबल - ७० डेसिबल\n(ब) व्यापारी क्षेत्र - ६५ डेसिबल - ५५ डेसिबल\n(क) निवासी क्षेत्र - ५५ डेसिबल - ४५ डेसिबल\n(ड) शांतता क्षेत्र - ५० डेसिबल - ४० डेसिबल\nआपण कोणत्या क्षेत्रात आहोत आणि तिथल्या आवाजाची पातळी नक्की किती डेसिबल आहे, हे सर्वसामान्य नागरीकांनी ओळखणे राज्य सरकारला नक्कीच अपेक्षित नसावे. त्यामुळे आपल्या कानांना त्रास होऊ लागल्यास आपण जरुर पोलिसांना १०० नंबरवर फोन करुन तक्रार देऊ शकतो. आता ध्वनिप्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियम, २००० मधील जे काही ब-यापैकी सुस्पष्ट नियम आहेत ते समजून घेऊ -\n* नियम ५ (१) नुसार सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरच्या वापरावर 'लेखी परवानगी' घेतल्याशिवाय संपूर्ण बंदी आहे. यामधे सार्वजनिक ठिकाण म्हणजे जिथे सर्वसामान्य जनतेला अशा लाऊडस्पीकरचा आवाज ऐकू येईल असे (खाजगी बंदिस्त ठिकाणे सोडून इतर कोणतेही) ठिकाण. या नियमामधे 'लेखी परवानगी' हा सर्वात महत्त्वाचा भाग असून, लेखी परवानगीशिवाय कोणत्याही झोनमधे, कोणत्याही वेळी - दिवसा किंवा रात्री, कितीही डेसिबलच्या आवाजाला सरसकट बंदी केलेली आहे. त्यामुळे, केव्हाही, कुठेही, कितीही आवाज करणारा लाऊडस्पीकर आपल्याला दिसला, तर आपण तो वाजवणा-यांना 'लेखी परवानगी घेतली आहे का' असे विचारु शकतो. आणि तशी ती घेतली नसल्यास त्यांच्याविरुद्ध तक्रार करु शकतो.\n* नियम ५ (२) नुसार सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरच्या वापराला रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत सर्वत्र संपूर्ण मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत आपल्याला लाऊडस्पीकरचा आवाज आला तर लेखी परवानगी आहे की नाही याचा विचार न करता आपण त्याविरुद्ध तक्रार करु शकतो. अर्थात, या नियमाला खालीलप्रमाणे अपवाद नंतर जोडण्यात आलेला आहे.\n* नियम ५ (३) नुसार राज्य सरकार सांस्कृतिक किंवा धार्मिक उत्सव व कार्यक्रमांसाठी रात्री १० नंतर (परंतु मध्यरात्री १२ पर्यंतच) लाऊडस्पीकरच्या वापरास विशेष परवानगी देऊ शकते. अशी विशेष परवानगीसुद्धा एका वर्षात फक्त पंधरा दिवसांसाठी देता येते आणि राज्य सरकारने असे दिवस आधीच जाहीर करणे अपेक्षित असल्याचे या नियमांमधे म्हटले आहे. तेव्हा अशा पंधरा दिवसांची यादी राज्य सरकारकडून आपण मागवू शकतो व त्याव्यतिरिक्त इतर दिवशी रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत लाऊडस्पीकर ऐकू आल्यास जरुर तक्रार करु शकतो.\n* नियम ५ अ (१) नुसार निवासी क्षेत्रामधे रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत कोणत्याही गाड्यांनी हॉर्न वाजवण्यावर बंदी आहे. याबद्दल तक्रार कशी व कुणाविरुद्ध करायची याचे स्पष्टीकरण या नियमांमधे दिलेले नाही. (मी स्वतः पुणे शहर परीमंडळ उपायुक्तांकडे याबद्दल मार्गदर्शनाची विनंती केली आहे. पुढील माहिती मिळाल्यास इथे जोडण्यात येईल.)\n* नियम ५ अ (२) नुसार आवाज करणारे फटाके उडवण्यास कोणत्याही दिवशी रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत (आणि शांतता क्षेत्रात २४ तास) सरसकट बंदी आहे. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत फटाके उडवण्यास परवानगी देण्याचा अधिकार कुठल्याही शासकीय कार्यालयास देण्यात आलेला नाही. त्यामुळे या वेळेत आपल्या आजूबाजूला कुणीही फटाके उडवून ध्वनिप्रदूषण करीत असेल तर आपण ताबडतोब पोलिसांकडे तक्रार करु शकतो. या नियमाला कसलाही अपवाद दिलेला नाही.\nलाऊडस्पीकर, हॉर्न, फटाके इत्यादींच्या ध्वनिप्रदूषणाबाबत आपण ध्वनिप्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियम, २००० च्या आधारे पोलिसांकडे तक्रार करु शकतो. २०१५ मधे उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालानुसार अशी तक्रार स्थानिक पोलिस स्टेशन अथवा शहर परीमंडळ उपायुक्तांकडे करण्यात यावी असे म्हटले आहे. अशा स्थानिक पोलिस स्टेशन व उपायुक्तांची नावे, फोन नंबर, व ई-मेल पत्ते स्थानिक प्रशासनाच्या (म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका वगैरेंच्या) वेबसाईटवर प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. (पुणे शहरासाठी परीमंडळ उपायुक्त व स्थानिक पोलिस स्टेशनची संपर्क यादी माझ्याकडे पीडीएफ स्वरुपात आहे. तसेच ध्वनिप्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियम, २००० ची मूळ पीडीएफ देखील उपलब्ध आहे. कुणाला हवी असल्यास ई-मेलने पाठविण्यात येईल.)\nध्वनिप्रदूषणाविरुद्ध तक्रार केल्यानंतर नक्की कशी कारवाई होणार, ध्वनिप्रदूषण ताबडतोब थांबवण्यासाठी पोलिस काय उपाययोजना करणार, ध्वनिप्रदूषण झाले की नाही हे कोण आणि कसे सिद्ध करणार, या सगळ्याबद्दल स्पष्टता आणण्याचे काम हे नियम अंमलात आणल्यापासूनच्या १५-१६ वर्षांत कुठल्याच सरकारने फारसे केलेले दिसत नाही. परंतु या नियमांच्या आधारे आपण किमान तक्रारी तरी नोंदवल्या पाहिजेत. अशी तक्रार स्थानिक पोलिसांनी नाकारली किंवा दुर्लक्षित केली किंवा उलट तक्रारदारालाच दमदाटी केली (ज्याची शक्यता जास्त आहे) तर संबंधित पोलिस अधिकारी / कर्मचारी / चौकी यांची नावे सार्वजनिकरीत्या जाहीर केली पाहिजेत. त्यासाठी वर्तमानपत्रे, रेडीओ चॅनेल यांची मदत घेता येईल. जेणेकरुन सर्व जनतेला अशा जबाबदारी टाळणा-या व अधिकाराचा गैरवापर करणा-यांबद्दल माहिती मिळेल आणि इतरांवर थोडा वचक बसू शकेल.\nपुढील काही प्रश्नांची उत्तरे माहितीच्या अधिकारातून व प्रत्यक्ष निरीक्षणातून शोधता येतील. गेल्या पंधरा-सोळा वर्षांत ध्वनिप्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियम, २००० नुसार कितीजणांवर कारवाई करण्यात आली सार्वजनिक मिरवणुकींना व रस्त्यांवरील मंडपांना परवानगी देताना हे नियम विचारात घेतले जातात का सार्वजनिक मिरवणुकींना व रस्त्यांवरील मंडपांना परवानगी देताना हे नियम विचारात घेतले जातात का मिरवणुकीच्या 'बंदोबस्ता'साठी उपस्थित असणारे पोलिस, मिरवणूक शांतता क्षेत्रात आल्यावर आव्वाज बंद करायला लावतात का मिरवणुकीच्या 'बंदोबस्ता'साठी उपस्थित असणारे पोलिस, मिरवणूक शांतता क्षेत्रात आल्यावर आव्वाज बंद करायला लावतात का रात्री १२ वाजता कानठळ्या बसवणारे फटाके उडवून वाढदिवस साजरा करण्याची जी नवी प्रथा सुरु झाली आहे, त्याविरुद्ध पोलिस काही कारवाई करु शकतात का रात्री १२ वाजता कानठळ्या बसवणारे फटाके उडवून वाढदिवस साजरा करण्याची जी नवी प्रथा सुरु झाली आहे, त्याविरुद्ध पोलिस काही कारवाई करु शकतात का मोठमोठ्याने आवाज करणा-या यामाहा, बुलेटसारख्या गाड्या आणि कर्णकर्कश्च हॉर्न वाजवणा-या बाईक, कार, टेम्पो, इत्यादींना जागेवर अडवून जप्तीची कारवाई करण्याचे अधिकार ट्रॅफिक पोलिसांना दिले जाऊ शकतात का मोठमोठ्याने आवाज करणा-या यामाहा, बुलेटसारख्या गाड्या आणि कर्णकर्कश्च हॉर्न वाजवणा-या बाईक, कार, टेम्पो, इत्यादींना जागेवर अडवून जप्तीची कारवाई करण्याचे अधिकार ट्रॅफिक पोलिसांना दिले जाऊ शकतात का अशा सर्व त्रासदायक 'आव्वाजा'विरुद्ध सर्वसामान्य नागरीकांनी तक्रार करावी की नाही, केलीच तर पुरावे काय द्यावेत, याबाबत पोलिसांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत\nकृपया ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी आणि वरील प्रश्नांची उत्तरे मिळवण्यास मदत करावी. शांतता हा आपला अधिकार आहे आणि तो आपण मिळवलाच पाहिजे\n'गौडबंगाल' हा शब्द तुम्ही अनेकदा वाचला असेल, वापरलाही असेल. पण या शब्दाचा नेमका अर्थ काय आणि बंगालशी त्याचा संबंध काय, असे प्रश्न तुम्हाला पडलेत का म्हणजे गौडबिहार किंवा गौडमहाराष्ट्र का नाही, गौड-बंगालच का म्हणजे गौडबिहार किंवा गौडमहाराष्ट्र का नाही, गौड-बंगालच का\n'गौडबंगाल' म्हणजे चटकन न समजणारी गोष्ट किंवा जादू, रहस्य.\n- गौड आणि वंग हे पूर्वी दोन वेगवेगळे पण शेजारी-शेजारी देश होते. वंग या शब्दाचा अपभ्रंश बंग आणि नंतर बंगाल असा झाला. गौड आणि वंग हे दोन्ही देश आता बंगालचा भाग आहेत.\n- पूर्वीपासून बंगालची काळी जादू प्रसिद्ध आहे. 'जय काली कलकत्तेवाली' असा मंत्र आजसुद्धा देशभरातले जादूगार वापरतात.\n- एखादी गोष्ट लवकर समजत नसेल किंवा चमत्कारासारखी वाटत असेल, तर तिला 'गौडबंगाल' असं म्हणतात. गौड आणि वंग भागातल्या सर्वोत्तम जादूगारांनी केलेली जादू म्हणजे गौड-बंगाल\n- उदाहरणार्थ, तरंगत्या मंदीराचं गौडबंगाल, देशाच्या अर्थव्यवस्थेचं गौडबंगाल, मिस्टर इंडीयाचं गौडबंगाल, डिसेंबरमधल्या पावसाचं गौडबंगाल, रस्तेदुरुस्तीच्या टेंडरचं गौडबंगाल, वगैरे.\nLabels: भाषा, मराठी, लेख\nशालाबाह्य मुलांचा प्रश्न - तिथंही आणि इथंही\nदि. २ मार्च २०१६ रोजी 'पाकिस्तान ऑब्झर्व्हर'नं शालाबाह्य मुलांसंदर्भात एक बातमी प्रसिद्ध केलीय. झोब जिल्ह्यातल्या सुमारे पंधरा हजार शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घरोघरी जाऊन प्रयत्न करण्याची घोषणा झोब जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी हबिबूर रेहमान मंडोखेल यांनी केल्याचं या बातमीत म्हटलंय. याच बातमीनुसार, पाकिस्तानात दोन ते तीन कोटी मुलं शाळेपासून वंचित आहेत. आतापर्यंतच्या सर्वच सरकारांनी शिक्षणाकडं केलेल्या लाजिरवाण्या व अक्षम्य दुर्लक्षामुळं ही परिस्थिती ओढवल्याचं या बातमीत म्हटलंय. तसंच, जी मुलं शाळेत किंवा मैदानावर दिसली पाहिजेत ती प्रत्यक्षात कारखाने आणि वीटभट्ट्यांवर शारीरिक कष्टाची कामं करताना किंवा भीक मागताना दिसत असल्यानं त्यांच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त केलीय. देशाला सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेचे गंभीर प्रश्न भेडसावत असताना, इतक्या मोठ्या संख्येनं मुलांचं शिक्षणापासून वंचित राहणं धोकादायक असल्याचं यात म्हटलंय. अशा लहान मुलांना आपल्या जहाल विचासरणीत सामील करुन घेणं धर्मांध व्यक्तींना सोपं जाईल अशी भीतीही यात व्यक्त केलीय. याच बातमीत, पाकिस्तानच्या शिक्षणावरील खर्चाची इतर शेजारी राष्ट्रांच्या खर्चाशी तुलना केलीय, ज्यानुसार पाकिस्तान आपल्या जीडीपीच्या फक्त २ टक्के रक्कम शिक्षणावर खर्च करतं. बांग्लादेश २.४ टक्के, भूतान ४.८ टक्के, भारत ३.१ टक्के, इराण ४.७ टक्के, आणि नेपाळ ४.६ टक्के शिक्षणावर खर्च करतात असं नोंदवलंय. देशातल्या साक्षरतेचं अचूक मोजमाप उपलब्ध नसलं तरी शासकीय अंदाज ६० टक्के आहे, जो श्रीलंकेपेक्षा खूपच कमी आहे. श्रीलंकेचा साक्षरतेचा अधिकृत आकडा आहे १०० टक्के. पाकिस्तानच्या सध्याच्या सरकारनं शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण सुधार कार्यक्रम जाहीर केला असला तरी याचा प्रचार आणि व्याप्ती वाढवण्याची गरज असल्याचं ‘पाक ऑब्झर्व्हर’नं म्हटलंय. देशाच्या काना-कोप-यात शिक्षणाचा उजेड पाडण्यासाठी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरीयम नवाज यांनी आता स्वतःच झोबसारख्या दुर्गम भागात जाऊन शाळाप्रवेशाच्या मोहीमेचं नेतृत्व केलं पाहिजे, अशी अपेक्षा या बातमीत व्यक्त केलीय.\nभारतातली शिक्षणाची अवस्थादेखील पाकिस्तानपेक्षा फारशी वेगळी नाही. उलट भारतात शालाबाह्य मुलांचा अधिकृत आकडा खूपच कमी सांगितला जातो. शासनातर्फे वारंवार सर्व्हेची टूम काढली जाते. गेल्या वर्षभरात घरोघरी जाऊन किमान चार ते पाच वेळा सर्व्हे केल्याचं महाराष्ट्र शासन आणि महानगरपालिकेनं वेळोवेळी जाहीर केलंय. यापैकी एकदाही आमच्या घरात किंवा परीसरात सर्व्हेसाठी कुणी फिरकल्याचं मला स्वतःला दिसलेलं नाही. शालाबाह्य मुलं शोधण्यातच इतका निरुत्साह असेल तर त्यांचे व त्यांच्या पालकांचे प्रश्न समजून घेऊन अशा मुलांना शाळेपर्यंत आणणं आणि टिकवणं तर लांबचीच गोष्ट आहे. शिवाय, वरच्या बातमीत उल्लेख केल्यानुसार भारताचा शिक्षणावरचा खर्च भूतान, इराण, आणि नेपाळ या शेजारी राष्ट्रांपेक्षाही कमी आहे. ज्यांच्या एक-दोन पिढ्या शिक्षित आहेत, अशा सुजाण भारतीयांनी सोयीस्कररीत्या सार्वजनिक शिक्षणापासून फारकत घेतलेलीच आहे. त्यामुळं सरकारी शाळांच्या शैक्षणिक दर्जाचं उघडं पुस्तक आणि खाजगी शाळांच्या शैक्षणिक-कम-आर्थिक व्यवहारांची झाकली मूठ या दोन्हींबद्दल बोलणं अवघड झालंय. शिक्षणहक्क कायदा आल्यानंतर अनौपचारिक शिक्षणाचे अनेक प्रयोग बंद पडल्यात जमा आहेत. त्यात अजून भर म्हणजे यंदा वीसपेक्षा कमी पटसंख्या असणा-या सरकारी शाळा बंद करायचे आदेशदेखील निघालेत. आणि विशेष म्हणजे या प्रश्नावर कुठंही चर्चासुद्धा होताना दिसत नाही. इतर ज्या हजारो सामाजिक-राजकीय प्रश्नांची चर्चा आपण दिवस-रात्र करतोय, त्या सर्वांचं उत्तर आहे - शिक्षण. सर्व भारतीय मुलांचं शिक्षण. स्थानिक, राज्य, आणि देश पातळीवर सरकारचं लक्ष या प्रश्नाकडं वेधून घेण्यासाठी आपण काय करणार आहोत सरकार जे काही आणि जेव्हा करेल ते करेल, पण आपण स्वतः याबद्दल काय करणार आहोत सरकार जे काही आणि जेव्हा करेल ते करेल, पण आपण स्वतः याबद्दल काय करणार आहोत फक्त आपल्या मुलांना शाळेत पाठवून आपली जबाबदारी संपत नाही. शिक्षणाकडं दुर्लक्ष करण्याचे जे धोके पाकिस्तानसमोर आहेत, तेच आपल्याही समोर आहेत, नाही का\nशालाबाह्य मुलांचा प्रश्न - तिथंही आणि इथंही\n\"बच्चा लोग, बजाओ ताली...\"\nशेतक-यांचं उत्पन्न २०२२ सालापर्यंत दुप्पट करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलीय. अर्थमंत्री अरुण जेटलींनीसुद्धा सहा वर्षांत शेतक-यांचं उत्पन्न डबल होईल, असं कन्फर्म केलंय. सहा वर्षांत शंभर टक्के वाढ म्हणजे वर्षाला साधारण बारा ते चौदा टक्क्यांनी उत्पन्न वाढलं पाहिजे. शेती करणा-या किंवा शेतीबद्दल शाळेत काहीतरी शिकलेल्या माझ्या मित्र-मैत्रिणींना हे माहितीच असेल की शेतीचं उत्पन्न सगळ्यात जास्त पाण्यावर अवलंबून असतं. सरकारी आकडे म्हणतात की आजही देशातली ६६ टक्के शेती मान्सूनवर म्हणजे बेभरवशाच्या पावसावर अवलंबून आहे. पुढच्या सहा वर्षांत किंवा किमान येत्या वर्षभरात तरी पाऊस नक्की किती, केव्हा, कसा पडेल हे निश्चित सांगणं अशक्य असताना, उत्पन्न मात्र बारा ते चौदा टक्क्यांनी कसं काय वाढणार हे कळत नाही. बरं मान्सूनवर नसेल अवलंबून रहायचं तर एवढं उत्पन्न वाढवण्यासाठी इरिगेशनच्या कुठल्या नविन स्कीम भाजपा सरकारनं जाहीर केल्याचंही ऐकण्यात नाही. ('जलयुक्त शिवार'बद्दल अभ्यासूंशी स्वतंत्र चर्चा करायला मला आवडेल.) गेल्या काही वर्षांतला शेतीचा वाढीचा दर (ग्रोथ रेट) माझ्या माहितीनुसार एक-दोन टक्क्यांच्या जवळपास आहे. मग एक-दोन टक्क्यांवरुन एकदम बारा-चौदा टक्के ग्रोथ रेट म्हणजे चमत्कारच नाही का मान्सून, इरिगेशन सोडून द्या, इतर काही स्पेशल बी-बियाणं, औषधं-टॉनिकं, आधुनिक शेतीचे प्रयोग वगैरेंबद्दल तरी काही ऐकायला मिळालंय का, जेणेकरुन हा एक टक्क्यावरुन बारा टक्क्यांवर जाण्याचा पराक्रम करता येईल मान्सून, इरिगेशन सोडून द्या, इतर काही स्पेशल बी-बियाणं, औषधं-टॉनिकं, आधुनिक शेतीचे प्रयोग वगैरेंबद्दल तरी काही ऐकायला मिळालंय का, जेणेकरुन हा एक टक्क्यावरुन बारा टक्क्यांवर जाण्याचा पराक्रम करता येईल मग जर शेतीची प्रॉडक्टिव्हिटी वाढण्याचे काहीच चान्स नसतील, तर शेतक-यांचं उत्पन्न वाढण्याचा दुसरा मार्ग कोणता मग जर शेतीची प्रॉडक्टिव्हिटी वाढण्याचे काहीच चान्स नसतील, तर शेतक-यांचं उत्पन्न वाढण्याचा दुसरा मार्ग कोणता शेतीमालाची किंमत वाढवणं म्हणजे येत्या वर्षभरात शेतीमालाच्या किंमतीमधे बारा-चौदा टक्क्यांची (आणि सहा वर्षांत दुप्पट भाववाढीची) आपण अपेक्षा ठेवायची का शेतक-याला मिळणा-या किंमतीत बारा टक्के वाढले तर 'एण्ड युजर' म्हणजे तुम्ही-आम्ही जो शेतीमाल किंवा प्रोसेस्ड प्रॉडक्ट विकत घेतो त्यामधे किती टक्के भाववाढीची तयारी ठेवायची शेतक-याला मिळणा-या किंमतीत बारा टक्के वाढले तर 'एण्ड युजर' म्हणजे तुम्ही-आम्ही जो शेतीमाल किंवा प्रोसेस्ड प्रॉडक्ट विकत घेतो त्यामधे किती टक्के भाववाढीची तयारी ठेवायची (म्हणजे पुढच्या निवडणुकीला विचारावं लागेल, अरे कुठं नेऊन ठेवलाय बाजारभाव आमचा (म्हणजे पुढच्या निवडणुकीला विचारावं लागेल, अरे कुठं नेऊन ठेवलाय बाजारभाव आमचा) काँग्रेस सरकारच्या २०१४-१५ साठीच्या बजेटमधे शेतीसाठी तरतूद होती साधारण १९ हजार कोटींची. शेतक-यांना द्यायच्या कर्जावरच्या व्याजासाठीचं अनुदान वजा केलं तर भाजपा सरकारनं २०१६-१७ च्या बजेटमधे शेतीसाठी केलेली तरतूद आहे साधारण २१ हजार कोटींची. मागच्या काही वर्षांतला ग्रोथ रेट वर सांगितलेला आहेच, तो बारा-चौदा पट वाढवण्यासाठी ही तरतूद पुरेशी वाटते का) काँग्रेस सरकारच्या २०१४-१५ साठीच्या बजेटमधे शेतीसाठी तरतूद होती साधारण १९ हजार कोटींची. शेतक-यांना द्यायच्या कर्जावरच्या व्याजासाठीचं अनुदान वजा केलं तर भाजपा सरकारनं २०१६-१७ च्या बजेटमधे शेतीसाठी केलेली तरतूद आहे साधारण २१ हजार कोटींची. मागच्या काही वर्षांतला ग्रोथ रेट वर सांगितलेला आहेच, तो बारा-चौदा पट वाढवण्यासाठी ही तरतूद पुरेशी वाटते का शेतक-यांचं उत्पन्न वाढलं पाहिजेच, त्याबद्दल दुमत नाही; पण ठोस उपाययोजनांशिवाय असं काहीतरी दुप्पट वाढ वगैरे बोलून दिशाभूल कशासाठी शेतक-यांचं उत्पन्न वाढलं पाहिजेच, त्याबद्दल दुमत नाही; पण ठोस उपाययोजनांशिवाय असं काहीतरी दुप्पट वाढ वगैरे बोलून दिशाभूल कशासाठी शेती किंवा शेतीपूरक व्यवसाय किंवा शेतीबाह्य रोजगार या कुठल्याही क्षेत्रात ठोस योजना जाहीर न करता शेतक-यांच्या आणि एकूणच देशाच्या डोळ्यांत धूळफेक का केली जातेय शेती किंवा शेतीपूरक व्यवसाय किंवा शेतीबाह्य रोजगार या कुठल्याही क्षेत्रात ठोस योजना जाहीर न करता शेतक-यांच्या आणि एकूणच देशाच्या डोळ्यांत धूळफेक का केली जातेय मला यातून दिसणारी आणखी एक शक्यता जास्त भीतीदायक आहे. शेतीमालाच्या बेसिक प्रायसिंगबद्दल सरकार उदासीन आहे, कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर शेतक-यांचा विश्वास उरलेला नाही, महागाई, आणि शहरी 'डेव्हलपमेंट'चं फॅड या सगळ्याचा परिणाम म्हणून शेतकरी शेतीकडं पाठ फिरवून आपल्या शेतजमिनी विकायला काढेल. त्यानं रियल इस्टेट आणि 'इंडस्ट्रियल फार्मिंग'ला तर 'अच्छे दिन' येतीलच, शिवाय आज लाख - दोन लाख कमावणारा शेतकरी २०२२ मधे जमीन विकून तीस-चाळीस लाख कमवेल आणि आपल्या 'जादूगार' पंतप्रधानांचं स्वप्न सत्यात उतरवेल. विचार करा, शेतीशी संबंधित आपल्या मित्र-मैत्रिणींशी चर्चा करा, आणि महत्त्वाचं म्हणजे यावर बोला. याकडं दुर्लक्ष करणं आपल्यापैकी कुणालाच परवडणार नाही एवढं नक्की\n\"बच्चा लोग, बजाओ ताली...\"\nवर्तमान परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी किती समर्पक रुपकं आपल्या पौराणिक / ऐतिहासिक कथा-कल्पनांमधे सापडतात नाही उदाहरणार्थ, यमुनेच्या पात्रात जलक्रिडेसाठी उतरलेल्या गोपी आणि काठावर काढून ठेवलेले त्यांचे कपडे पळवणारा कन्हैया उदाहरणार्थ, यमुनेच्या पात्रात जलक्रिडेसाठी उतरलेल्या गोपी आणि काठावर काढून ठेवलेले त्यांचे कपडे पळवणारा कन्हैया म्हणजे असं बघा की, गोपींचे कपडे त्यांनी स्वतःच उतरवले होते, त्यात कृष्णाचा दोष नव्हता. बरं, त्यांचे कपडे पळवून त्याला ना ते स्वतःला घालायचे होते, ना कुठं नेऊन विकायचे होते. सार्वजनिक ठिकाणी कपडे काढून जलक्रीडा करण्याच्या कृतीची जबाबदारी गोपींनी स्वीकारावी, एवढीच बिचा-याची अपेक्षा असणार, नाही का म्हणजे असं बघा की, गोपींचे कपडे त्यांनी स्वतःच उतरवले होते, त्यात कृष्णाचा दोष नव्हता. बरं, त्यांचे कपडे पळवून त्याला ना ते स्वतःला घालायचे होते, ना कुठं नेऊन विकायचे होते. सार्वजनिक ठिकाणी कपडे काढून जलक्रीडा करण्याच्या कृतीची जबाबदारी गोपींनी स्वीकारावी, एवढीच बिचा-याची अपेक्षा असणार, नाही का म्हणजे कसंय, निवडणुकीच्या वेळी वारेमाप आश्वासनं दिली एखाद्या नेत्यानं आणि सत्तेवर आल्यावर त्या आश्वासनांची वस्त्रं उतरवून सत्तेचा उपभोग घ्यायचा प्रयत्न केला, तर ती वस्त्रं चढवण्याची आणि उतरवण्याची जबाबदारी पण स्वीकारावी की नाही म्हणजे कसंय, निवडणुकीच्या वेळी वारेमाप आश्वासनं दिली एखाद्या नेत्यानं आणि सत्तेवर आल्यावर त्या आश्वासनांची वस्त्रं उतरवून सत्तेचा उपभोग घ्यायचा प्रयत्न केला, तर ती वस्त्रं चढवण्याची आणि उतरवण्याची जबाबदारी पण स्वीकारावी की नाही का आपणच उतरवून ठेवलेली वस्त्रं एखाद्या कन्हैयानं पळवून जगाला दाखवली तर त्यालाच पूर्ण दोष द्यायचा का आपणच उतरवून ठेवलेली वस्त्रं एखाद्या कन्हैयानं पळवून जगाला दाखवली तर त्यालाच पूर्ण दोष द्यायचा तो काही म्हणाला नव्हता, तुम्ही वस्त्रं चढवा किंवा उतरवा म्हणून. फक्त ती वस्त्रं 'आत्ता' तुमच्या अंगावर नाहीत, एवढंच तो सांगतोय. मग एवढा राग कशाचा येतोय नक्की तो काही म्हणाला नव्हता, तुम्ही वस्त्रं चढवा किंवा उतरवा म्हणून. फक्त ती वस्त्रं 'आत्ता' तुमच्या अंगावर नाहीत, एवढंच तो सांगतोय. मग एवढा राग कशाचा येतोय नक्की आपण उघडे पडल्याचा की ती वस्त्रंच खोटी असण्याचा\n(डिस्क्लेमर - सदर रुपकात कोणाही जिवंत किंवा मृत व्यक्तिचे अथवा पक्षाचे नाव घेण्यात आले नसल्याने जो-तो आपापल्या इच्छेनुसार यात नावे घालू शकतो. त्यावरुन दुखावल्या जाणा-या भावना अथवा होणा-या गुदगुल्या या दोन्हींची जबाबदारी प्रस्तुत लेखक स्वीकारत नाही.)\nजात - आर्थिक की बिगरआर्थिक\n\"जात ही पूर्ण शंभर टक्के बिनआर्थिक रचना आहे काय केवळ सामाजिक रचना आहे काय केवळ सामाजिक रचना आहे काय ती शंभर टक्के बिगरआर्थिक रचना नाही. त्याच्यामधे अर्थरचनेचा भाग आहे. पण तिला शंभर टक्के आर्थिक म्हणता येत नाही. खालच्या जातीचे लोक गरीब आहेत आणि वरच्या जातीचे लोक श्रीमंत आहेत, हा अनुभव आजचा नव्हे, हजारो वर्षांपासूनचा आहे. याचा काही ना काही अर्थकारणाशी संबंध असल्याखेरीज ही गोष्ट घडली नाही. आणि असं का घडलं असावं ती शंभर टक्के बिगरआर्थिक रचना नाही. त्याच्यामधे अर्थरचनेचा भाग आहे. पण तिला शंभर टक्के आर्थिक म्हणता येत नाही. खालच्या जातीचे लोक गरीब आहेत आणि वरच्या जातीचे लोक श्रीमंत आहेत, हा अनुभव आजचा नव्हे, हजारो वर्षांपासूनचा आहे. याचा काही ना काही अर्थकारणाशी संबंध असल्याखेरीज ही गोष्ट घडली नाही. आणि असं का घडलं असावं व्यवसाय बदलायचं स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आलं होतं. आणि मग कमी उत्पन्नाचा, बिनउत्पन्नाचा व्यवसाय काही लोकांच्या माथी मारण्यात आला. आणि त्याच्यामधून त्यांचं दारिद्र्य तसंच चालू राहिलं. जात ही रचना पूर्ण अंशाने आर्थिक नाही आणि पूर्ण अंशाने बिगर-आर्थिकही नाही.\"\n- कॉ. गोविंद पानसरे, जानेवारी २०१४\nजात - आर्थिक की बिगरआर्थिक\nकाय गंमत आहे नाही शाळा-कॉलेजात गणेशोत्सव आणि शिवजयंती साजरी करायला आपली हरकत नसते. पण शाळा-कॉलेजातल्या मुलांनी राजकारणावर बोललेलं मात्र आपल्याला खपत नाही. म्हणजे आपल्याला पुढच्या पिढीकडून नक्की काय अपेक्षित आहे शाळा-कॉलेजात गणेशोत्सव आणि शिवजयंती साजरी करायला आपली हरकत नसते. पण शाळा-कॉलेजातल्या मुलांनी राजकारणावर बोललेलं मात्र आपल्याला खपत नाही. म्हणजे आपल्याला पुढच्या पिढीकडून नक्की काय अपेक्षित आहे एका लोकशाही देशाचे सुजाण नागरिक बनणं की झुंडशाहीपुढं माना तुकवणारे दैववादी बनणं\nLabels: मराठी, मुक्तविचार, लेख\nकन्हैया कुमार - एक नवी आशा\nजवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटी (जेएनयु) मधे देशविरोधी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आणि देशद्रोही घोषणा दिल्याबद्दल तीन आठवडे तुरुंगात टाकलेल्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारला अखेर सोडून द्यावंच लागलं. मीडिया, केंद्र सरकार, गृहमंत्र्यांसहीत अनेक महत्त्वाचे मंत्री, खासदार, आमदार, विद्यार्थी संघटना, अशा अनेक स्वयंघोषित देशभक्त लोकांनी आटोकाट प्रयत्न करुनही एका सामान्य विद्यार्थी कार्यकर्त्याचा आवाज ते दडपू शकले नाहीत. तुरुंगातून बाहेर आल्यावर कन्हैयानं दिलेलं भाषण म्हणजे सर्वसामान्यांना देशातल्या सध्याच्या परिस्थितीबद्दल वाटणा-या भावनांचंच प्रतीक आहे. ज्या घोषणांच्या व्हिडीयोमधे मोडतोड करुन भाजपा सरकार आणि मीडियानं कन्हैयाला देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न केला, त्याच घोषणा त्यानं तुरुंगातून बाहेर आल्यावर आपल्या भाषणात दिल्यात. 'हम क्या चाहते - आजादी है हक हमारा - आजादी है हक हमारा - आजादी भ्रष्टाचार से - आजादी भ्रष्टाचार से - आजादी भूकमरी से - आजादी भूकमरी से - आजादी सामंतवाद से - आजादी सामंतवाद से - आजादी' या त्या घोषणा. कन्हैयाबरोबर इतर शेकडो विद्यार्थी कार्यकर्ते न घाबरता, न लाजता या घोषणा देतायत हे चित्र नक्कीच आशादायक आहे, असं मला वाटतं.\nआपल्या भाषणामधे कन्हैयानं स्पष्ट केलंय की, 'आमच्या मनात (ज्यांच्यामुळं या 'देशद्रोही' प्रकरणाची सुरुवात झाली त्या) एबीव्हीपीबद्दल कसलीही वाईट भावना नाही, कारण आम्ही खरोखर लोकशाहीवादी आहोत. आमचा खरोखर राज्यघटनेवर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच आम्ही त्यांना शत्रू नाही तर विरोधक मानतो.' शत्रू आणि विरोधक यातला फरक या देशाच्या सरकारला समजू शकला नसला तरी एका विद्यार्थ्याला तो समजला ही फारच पॉझिटीव्ह गोष्ट मला वाटते.\nआपल्या भाषणात कन्हैयानं जेएनयुचे आणि या लढ्यामधे जेएनयुसोबत उभं राहिलेल्या सर्वांचे आभार मानलेत. देशाचं सरकार आणि बहुतांश मीडिया ज्या व्यक्तिच्या, संस्थेच्या विरुद्ध कट-कारस्थानं रचतायत, ज्यांना देशद्रोही ठरवण्यासाठी जिवाचं रान करतायत, त्यांच्या बाजूनं उभं राहणं ही सोपी गोष्ट नाही. म्हणूनच कन्हैया फक्त त्याला स्वतःला सपोर्ट करणा-यांना नव्हे तर 'सही को सही और गलत को गलत' म्हणणा-या सर्वांना सलाम करतोय. या संपूर्ण प्रकरणाचा एक मजेशीर पैलू त्यानं उलगडून दाखवला. जेएनयुला देशद्रोह्यांचा अड्डा ठरवणं, विद्यार्थी कार्यकर्त्यांची फेलोशिप बंद करुन त्यांना आर्थिकदृष्ट्या लाचार बनवणं, स्वतंत्र विचार करु शकणा-या व्यक्ती आणि संस्थांवर खोटेनाटे आरोप करुन त्यांना आधी बदनाम आणि नंतर बंद पाडणं, एबीव्हीपी - जेएनयु प्रशासन - दिल्ली पोलिस यांच्या संगनमतानं कन्हैयाला देशद्रोहासारख्या गंभीर गुन्ह्यात गोवणं, हे सगळं पूर्वनियोजित कारस्थान होतं. खूप मोठमोठे नेते, मंत्री, मीडिया या सगळ्यांनी मिळून विचारपूर्वक हा कट रचला. पण त्यावर देशभरातून इतकी मोठी प्रतिक्रिया येईल ह्याचा अंदाजच त्यांना आला नसेल. कन्हैया म्हणतो, 'उनका सबकुछ प्लॅन्ड था, हमारा सबकुछ स्पाँटेनियस था' खरंच, खोटं शंभर वेळा बोलून ते खरं ठरवण्याची युक्ती यावेळी तरी फसली असंच म्हणावं लागेल.\nकन्हैयानं जेएनयुच्या विद्यार्थ्यांसमोर याआधी दिलेली भाषणं, त्यात मांडलेले मुद्दे, दिलेल्या घोषणा यांची 'विरोधकां'नी मोडतोड केली खरी, पण यावेळच्या भाषणात कन्हैयानं अगदी स्पष्ट सांगितलंय, 'भारत 'से' नही मेरे भाईयों, भारत 'में' आजादी माँग रहे हैं' भारतीय राज्यघटनेतल्या 'समानते'च्या तत्त्वाची अगदी सोप्या शब्दांत व्याख्या कन्हैयानं केलीय, 'इक्वॅलिटी मतलब चपरासी का बेटा और राष्ट्रपती का बेटा एक स्कूल में पढाई कर सके' भारतीय राज्यघटनेतल्या 'समानते'च्या तत्त्वाची अगदी सोप्या शब्दांत व्याख्या कन्हैयानं केलीय, 'इक्वॅलिटी मतलब चपरासी का बेटा और राष्ट्रपती का बेटा एक स्कूल में पढाई कर सके' आहे का आपल्यात धमक हे चॅलेंज स्वीकारायची' आहे का आपल्यात धमक हे चॅलेंज स्वीकारायची नेते, राजकारणी, मंत्री यांचं जाऊ द्या, पण तुम्हा-आम्हाला तरी ही इक्वॅलिटी समजलीय का नेते, राजकारणी, मंत्री यांचं जाऊ द्या, पण तुम्हा-आम्हाला तरी ही इक्वॅलिटी समजलीय का समजली तर पटेल का समजली तर पटेल का इस बात पे सलाम, कन्हैया\nएक विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून विद्यापीठाच्या आवारात आंदोलनं करणं आणि थेट केंद्र सरकारला भिडून आपला घटनात्मक हक्क मागणं, ह्यातला फरक स्वतः कन्हैयाच्याही आता लक्षात आलाय. 'सेल्फ क्रिटीसिझम' करताना कन्हैया म्हणतो, 'पहले पढता जादा था, सिस्टम को झेलता कम था इस बार पढा कम हूँ, सिस्टम को झेला जादा है इस बार पढा कम हूँ, सिस्टम को झेला जादा है' सिस्टमला 'झेलण्या'साठी काय ताकद लागते ते स्वतः अनुभव घेतल्याशिवाय नाही कळायचं. आपल्याला लहानपणापासून सिस्टमशी जुळवून घ्यायलाच शिकवलं जातं. 'सही को सही, गलत को गलत' म्हणणा-याला लोक एक तर हसतात किंवा संपवतात. सिस्टमला झेलायला लागलो की आपलं पुस्तकी ज्ञान किती तोकडं आहे, हे कळायला लागतं. पण ताठ मानेनं जगायचं असेल तर सिस्टमशी एडजस्ट करुन नाही तर सिस्टमला भिडून दाखवावं लागतं. कुणाची इच्छा असेल हा अनुभव घ्यायची, तर चार दिवस माझ्याबरोबर राहून बघा. कन्हैयाबद्दल मला वाटणा-या कळकळीचं मूळ त्यात सापडेल तुम्हाला\nमीडिया आणि केंद्र सरकारनं पद्धतशीरपणे जेएनयु आणि कन्हैयाची इमेज तोडण्याचा प्रयत्न केला. त्याचेच शब्द, त्याचीच भाषणं मोडतोड करुन लोकांपर्यंत पोचवली आणि सर्वसामान्यांसमोर 'देशद्रोही' म्हणून त्याला उभं केलं. कन्हैया आणि जेएनयुचे मुद्दे, त्यांची जिद्द, त्यांचा संघर्ष सर्वसामान्यांपर्यंत पोचलाच नाही. जे पोचलं ते संदर्भहीन आणि चुकीचं पोचलं. याबद्दल आत्मपरीक्षण करताना कन्हैया म्हणतो, 'जेएनयु के लोग बहुत सभ्य, शालीन तरीके से बात करते हैं, लेकीन बहुत ही भारी टर्मिनॉलॉजी में बोलते हैं ये बात देश के आम लोगों के समझ में नही आती ये बात देश के आम लोगों के समझ में नही आती उनका दोष नही है उनका दोष नही है वो इमानदार, नेक, समझदार लोग हैं वो इमानदार, नेक, समझदार लोग हैं आपही उनके लेवल पे जाकर चीजों को नही रखते आपही उनके लेवल पे जाकर चीजों को नही रखते' हा कन्हैयाच्या भाषणाचा हायलाईट होता असं मला वाटतं. बुद्धीवादी, वैचारीक कार्यकर्त्यांमागं गर्दी उभी राहत नाही, कारण त्यांचे मुद्दे फारच तात्विक, तार्किक, आणि समजायला अवघड असतात. पण जी व्यक्ती सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत हेच मुद्दे मांडू शकली तिच्यामागं अख्खा देश उभा राहिला, हादेखील याच देशाचा इतिहास आहे. त्यामुळं मुद्देसूदपणासोबत हे सेल्फ-क्रिटीसिझम कन्हैया आणि त्याच्या साथीदारांना तर मोठं यश मिळवून देऊ शकेलच, पण इतरही कर्यकर्त्यांनी या दिशेनं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे, असं मला वाटतं.\nआपल्या भाषणात कन्हैयानं संघ, भाजपा सरकार, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका केलीय. विशेष म्हणजे ही टीका राजकीय न वाटता, सर्वसामान्य जनतेची प्रातिनिधिक प्रतिक्रिया वाटते. 'काँग्रेसमुक्त भारता'ची घोषणा देऊन मोदींनी केंद्रात आणि काही राज्यांत सत्ता मिळवली खरी, पण निवडणुकीच्या वेळी ज्या चमत्कारांच्या जोरावर, आश्वासनांच्या खैरातीवर जनतेला त्यांनी भुलवलं, त्यातलं काहीच प्रत्यक्षात घडताना दिसत नाही. काळा पैसा परत आणण्याच्या वचनावर मोदी मूग गिळून गप्प बसलेत. भ्रष्टाचाराच्या बाबतीत काँग्रेस सरकार आणि भाजप सरकार यांच्यात फरक काय हेच कळत नाहीये. धार्मिक तेढ वाढवण्याचे प्रयत्न वारंवार अधिकृत प्रवक्ते, मंत्री, आणि लोकप्रतिनिधीच करताना दिसतायत. ज्या कन्हैयाचे वडील शेतकरी आणि भाऊ सैनिक आहे, त्याच कन्हैयाला 'देशद्रोही' ठरवून सैनिक विरुद्ध कार्यकर्ते असा काहीतरी खोटा संघर्ष निर्माण करायचा प्रयत्न केला गेला. आणि मनमोहन सिंगांच्या मौनव्रताची वारंवार बालीश खिल्ली उडवणारे आपले बोलघेवडे पंतप्रधान मोदी या प्रकरणावर मात्र चुकूनसुद्धा काही बोलले नाहीत. उलट थातुर-मातुर गोष्टींवर 'मन की बात' करत राहिले. खोट्या व्हिडियोच्या आधारे देशातील एका प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षाला हॉस्टेलमधे घुसून अटक केली जाते, कोर्टाच्या आवारात त्याला पोलिसांदेखत मारहाण केली जाते, कुठलाही गुन्हा सिद्ध झालेला नसताना मीडिया त्याला 'देशद्रोही, देशद्रोही' म्हणून देशभर बदनाम करते, केंद्रीय गृहमंत्री खोट्या ट्विटच्या आधारे त्याचे संबंध पाकिस्तानशी जुळवून टाकतात, आणि कसलाही गुन्हा केलेला नसताना सर्वसामान्य कुटुंबातला एक निरपराध विद्यार्थी तीन आठवडे तुरुंगात पडून राहतो, या सगळ्यावर बोलण्यासाठी आपल्या पंतप्रधानांना एक तर वेळ नाही किंवा त्यांना हे प्रकरण तितकं महत्त्वाचं वाटत नाही. याशिवाय तिसरी शक्यता जास्त धोकादायक आहे, ते म्हणजे - मोदींना या सगळ्या प्रकरणाच्या खोटारडेपणाची माहिती आधीपासूनच होती आणि स्वतःची 'इमेज' जपण्यासाठी त्यांनी मूक संमती देऊन यावर प्रत्यक्ष बोलणं मुद्दामहून टाळलं. यातलं नक्की खरं काय ते मोदी स्वतःच सांगू शकतील, पुढच्या एखाद्या 'मन की बात' मधून. कन्हैयाची 'ये मन की बात कहते है, सुनते नही' ही टीका मोदीभक्त, भाजपप्रेमी, आणि संघवाल्यांना जरुर झोंबणार आहे, पण म्हणून काही ते पुन्हा कन्हैयाला 'देशद्रोही' ठरवू शकणार नाहीत. आता तरी त्यांनी कन्हैयाच्या भाषणाला मुद्देसूद उत्तर द्यावं, उगाच 'विद्यार्थ्यांनी शिकताना राजकारण करु नये' अशी बालिश आणि निर्बुद्ध वक्तव्यं करुन स्वतःचंच हसं करुन घेऊ नये.\nकन्हैया म्हणतो की देशातल्या जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर सरकारला चर्चाच करायची नाहीये. उलट जनतेचं लक्ष त्यावरुन कसं भरकटेल यासाठीच सरकार प्रयत्न करतंय. मग त्यासाठी आज जेएनयुला 'देशद्रोह्यांचा अड्डा' म्हणतील, तर उद्या 'मंदीर वही बनायेंगे'ची टूम काढतील. तुरुंगात असताना कन्हैयानं बघितलं की आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास वर्गातील माणसंच पोलिस खात्यात नोकरी करतायत. त्यानं स्वतः कॉन्स्टेबलपासून इन्स्पेक्टरपर्यंत पोलिसांशी संवाद साधला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हे आणि आपण सारखेच आहोत. फक्त आपण अजून विचार करु शकतोय आणि ह्यांनी विचार करणं सोडून दिलंय किंवा व्यवस्थेनं त्यांना भरकटून सोडलंय. कन्हैयाचे तुरुंगवासातले अनुभव खरोखर ऐकण्यासारखे आहेत. त्याला एका पोलिसानं विचारलं, 'धरम मानते हो' यावर कन्हैया म्हणाला, 'धरम जानते ही नहीं' यावर कन्हैया म्हणाला, 'धरम जानते ही नहीं पहले जान ले, फिर मानेंगे पहले जान ले, फिर मानेंगे' आणि मग त्यानं त्या पोलिसाला विचारलं, 'माझ्या माहितीनुसार हे विश्व देवानं बनवलंय आणि इथल्या कणाकणात ईश्वर आहे, पण मग काही लोक 'देवासाठी' काहीतरी बांधायचं म्हणतायत, तुमचं म्हणणं काय आहे' आणि मग त्यानं त्या पोलिसाला विचारलं, 'माझ्या माहितीनुसार हे विश्व देवानं बनवलंय आणि इथल्या कणाकणात ईश्वर आहे, पण मग काही लोक 'देवासाठी' काहीतरी बांधायचं म्हणतायत, तुमचं म्हणणं काय आहे' सर्वसामान्य कुटुंबातनं आलेला तो पोलिस म्हणाला, 'महाबुड़बक आयडीया है' सर्वसामान्य कुटुंबातनं आलेला तो पोलिस म्हणाला, 'महाबुड़बक आयडीया है' (बुड़बक म्हणजे मूर्ख, स्टुपिड.) योग्य पद्धतीनं सर्वसामान्यांशी संवाद साधला, त्यांच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष टिकवून ठेवलं तर जनता पुन्हा-पुन्हा भूलथापांना आणि विषारी प्रचाराला बळी पडणार नाही, अशी आशा या अनुभवांमधून निर्माण होते.\nआपल्या भाषणाच्या शेवटी कन्हैया पुन्हा एकदा स्वातंत्र्याची घोषणा देतोय. त्याचं म्हणणं आहे की, स्वातंत्र्याच्या या घोषणा संपूर्ण देशातल्या जनतेपर्यंत पोचल्या पाहिजेत. तो म्हणतो, 'भारतसे नही, भारत को लूटनेवालोंसे आजादी माँगते हैं हम क्या चाहते - आजादी हम क्या चाहते - आजादी है हक हमारा - आजादी है हक हमारा - आजादी भ्रष्टाचार से आजादी हम लेके रहेंगे - आजादी\nहे फक्त कन्हैयाच्या भाषणाचं रिपोर्टिंग नाही. कन्हैयानं कित्येकांच्या मनातल्या भावनांना शब्द दिलेत, आवाज दिलाय. मला स्वतःला हा आवाज, हे शब्द ओळखीचे वाटतायत, म्हणून इथं मांडलेत. तुम्हालाही ते ओळखीचे वाटले तर जरुर सांगा. गप्प राहून चालणार नाही. न मागता काहीही मिळणार नाही. आपल्याला काय वाटतंय, काय पटतंय, हे मांडता येणार नसेल तर आपल्या शिक्षणाचा उपयोगच काय\nकन्हैया कुमार - एक नवी आशा\nLabels: मराठी, राजकीय, लेख\nया ब्लॉगवरील नवे लिखाण ई-मेलद्वारे मिळवाः\nशालाबाह्य मुलांचा प्रश्न - तिथंही आणि इथंही\n\"बच्चा लोग, बजाओ ताली...\"\nजात - आर्थिक की बिगरआर्थिक\nकन्हैया कुमार - एक नवी आशा\nया ब्लॉगवरचे विचार आणि शब्द मुक्त आहेत. तुम्ही वाचा आणि इतरांनाही वाचू द्या. - मंदार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://kanifnathmadhi.org/aavahan.php", "date_download": "2018-08-18T08:53:46Z", "digest": "sha1:CSMW2Z7OC7DX4VHJ2FBVU7DM4XDAAJIC", "length": 15410, "nlines": 45, "source_domain": "kanifnathmadhi.org", "title": "नम्र अवाहन", "raw_content": "॥ ॐ चैतन्य कानिफनाथाय नम: ॥\nआजीवन अन्नदान सभासद नाव नोंदणी व सुवर्णकलश निधी\nश्री क्षेत्र मढी ता.पाथर्डी जि. अहमदनगर येथे चैतन्य कानिफनाथ महाराजांचे संजीवन समाधी मंदिर आहे. सदर देवस्थान हे नवनाथापैकी असून ऎतिहासिक व जागृत असल्यामुळे सर्वांचे शक्तीस्थान आहे. येथे दररोज हजारो तर मासिक व वार्षिक उत्सवामध्ये देशविदेशातील लाखो भाविक नाथ दर्शनाचा लाभ घेतात. संत महात्मे, ऋषीमुनीसारखे नाथभक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतात त्या मुळे हे देवस्थान संपूर्ण भारतभरामध्ये प्रसिध्द आहे.\nयेथे देशविदेशातील अनेक थोर नाथभक्त चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेऊन निसर्गरम्य अशा गर्भ गिरीपर्वत परिसराची पहाणी येथील महात्म्य जाणून घेणेसाठी वांरवार श्री क्षेत्र मढी येथे येतात. श्री क्षेत्र मढी येथे येणारे नाथभक्त अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे लक्षात घेऊन, श्री कानिफनाथ देव मढी ट्रस्टतर्फे सुरु केलेल्या आजीवन अन्नदान सभासद योजनेत रुपये ११,१११/- एकवेळ जमा करुन नवनाथ भक्तांनी मोठा प्रतिसाद दिलेला असून मोठ्या संख्येने नवीन सभासद नोंदणी करीत आहेत.\nसदरच्या सभासद निधीबरोबरच अनेक नाथभक्त अन्नधान्य, स्वयपाक भांडी व किराणा स्वरुपात मदत करतात. विशेष म्हणजे अन्नछत्रालयासाठी ऑस्ट्रेलियास्थित व्यवसाय करत असलेले हरियाना निवासी नाथभक्त श्री राकेश कुमार यांना नाथांचा साक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी श्री क्षेत्र मढीचा शोध घेऊन वेळोवेळी नाथ दर्शनाचा लाभ घेत असून श्री क्षेत्र मढीतर्फे नाथभक्तांच्या सुविधेसाठी मोफत चालू असलेल्या अन्नछत्रालयासाठी आवश्यक असलेला उच्चप्रतीचा बासमती तांदुळ ते चैतन्य अन्नछत्रालयासाठी अर्पण करत आहेत. विशेष म्हणजे महाप्रसाद घेणाऱ्या नाथभक्तांकडून त्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. अशा या पवित्र अन्नछत्रालयामध्ये दररोज सकाळी ११ ते दुपारी ०२ व रात्री ०९ ते १० या वेळेत मोफत महाप्रसाद दिला जात आहे. येथील अन्नछत्रालयामधील महाप्रसाद घेणाऱ्या भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेता अन्नछत्रालयाचे प्रशस्त हॉलमध्ये स्थलांतर केले आहे. तरी या धार्मिक कार्यासाठी दानशूर नाथ भक्तांनी रोख अथवा ऑनलाईन किंवा अन्नधान्य अथवा स्वंयपाक साहित्य स्वरुपात मदत करण्याचे अवाहन श्री कानिफनाथ ट्रस्टतर्फे करण्यात येत आहे.\nदुसरे म्हणजे ऎतिहासिक अशा श्री क्षेत्र मढीदेवस्थानचे महात्म्य लक्षात घेता दिवंसेदिवस भाविकांच्या संख्येत वाढ होत चाललेली असून येथे वर्षभर विविध जाती र्धमाचे मेळावे, नवनाथपारायण, आओग्य शिबिरे, किर्तने, प्रवचन सामाजिक प्रबोधन, शालेय शिबिरे व अखंड हरिनाम सप्ताहासारखे धार्मिक कार्यक्रम चालतात. सदर कार्यक्रमाबरोबरच विविध प्रांतामधून हजारोच्या संख्येने नाथ दिंड्या श्री क्षेत्र मढी येथे मुक्कामी येतात.\nश्री क्षेत्र मढीला येणाऱ्या वाढत्या भाविकांच्या निवारा सुविधेसाठी भव्य असे भक्तनिवास असून पार्कींगची त्याच प्रमाणे चहा व नाश्ता सुविधेसाठी कँन्टीन सुरु करण्यात आलेली असून वाढत्या निवारा सुविधांसाठी भव्य भक्त निवास बांधकामाचा विकास आराखडा तयार केलेला असून सदर बांधकामासाठी नाथभक्तांनी सढळ हाताने देणगी दान करण्याचे अवाहन देव ट्रस्टतर्फे करण्यात येत आहे.\nविविध धार्मिक कार्यक्रमा शिवाय येथे मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी नाथ दर्शनाचा लाभ घेऊन नाथ संप्रदायाचा अभ्यास करतात. येथिल निसर्गरम्य वातावरनात अनेक होतकरु विद्यार्थ्यानी मोठ्या चिकाटीने चांगल्या नोकऱ्या संपादन केलेल्या असून अनेक होतकरु विद्यार्थी स्पर्धा परिक्षेच्या तयारीत आहेत.\nविशेष म्हणजे काही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थीती नाजूक असल्यामुळे त्यांना स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक पुस्तके उपलब्ध होत नाहीत हे लक्षात घेवून श्री कानिफनाथ देव ट्र्स्टच्या कार्यरत विश्वस्त मंडळाने होतकरु विद्यार्थ्यांसाठी सेवाभावी तत्वावर वाचनालय व ग्रंथालय सुरु केलेले आहे.\nगरीब व होतकरु विद्यार्थ्यांसाठी UPSC, MPSC‚ CET, TET, बँकीग, वन, फायरब्रिगेड, ग्रामसेवक, तलाठी आदि भरतीसाठीचे मार्गदर्शक पुस्तके तर नाथ दर्शनासाठी व अनुष्ठान भविकांना माहिती संपादन करणेसाठी गीता, ज्ञानेश्वरी, नवनाथ संबधीत ग्रंथ तसेच ग्रंथालयासंबधीत साहित्य चैतन्य वाचनालयास अर्पण करण्याबद्दलचे अवाहन श्री कानिफनाथ ट्रस्टतर्फे करण्यात येत आहे.\nविशेष म्हणजे श्री कानिफनाथ मंदिराचे बांधकाम छत्रपती शाहू महाराज यांचे आज्ञेवरुन त्यांचे सरदार चिमाजी सावंत यांचे देखरेखीखाली १७ व्या शतकात पूर्ण झालेले आहे. सदर बांधकामास अनेक वर्षे होऊन गेलेले आहेत. अशा ऎतिहासिक गड बांधकामाची व ऎतिहासिक बारवांची अनेक ठिकाणी तुटफूट झाल्यामुळे भविष्यात प्राणहानी होऊ नये हे लक्षात घेऊन कार्यरत विश्वस्त मंडळाने जिर्णोध्दराचे काम हाती घेतलेले आहे.\nजिर्णोध्दराबरोबरच मंदिर परिसरातील बहुउद्देशिय सभामंडप, भक्तनिवास, प्रथमोपचारकेंद्र, आयुर्वेदिक हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, दिशादर्शक कमान, मंदिर परिसरातले पारंपारिक रस्ते, स्वछतागृह, वाहनतळ, बागबगिचा, ध्यानसाधणा व योगाभ्यास हॉल, पारायण हॉल, नाथवस्तु संग्रहालय, व वसतीगृहासारख्या अनेक विकासकामे विचारधिन व प्रस्तावित आहेत.\nतरी चालू असलेल्या विकास कामांसाठी व प्रस्तावित योजनांसाठी नाथ भक्तांनी सढळ हाताने श्री कानिफनाथ महाराज चरणी देणगी दान करण्याचे अवाहन श्री कानिफनाथ देव ट्रस्टतर्फे करण्यात येत आहे.\nकैकाड्याची काठी व गोपाळ समाजाची मानाची होळी\n(दि. १ मार्च २०१८)\nरंगपंचमी (नाथसमाधी दिन सोहळा)\n(दि. ६ मार्च २०१८)\n(दि. १३ मार्च ते १६ मार्च २०१८)\nफुलबाग यात्रा (जलाभिषेक कावड सोहळा)\n(दि. १७ मार्च २०१८)\n(दि. १८ मार्च २०१८)\nदि. ०९ व १० सप्टेंबर रोजी नाथसंमेलनाचे आयोजन. नाथसंमेलनासाठी राष्ट्रीय संत गुरुदेव भय्युजी महाराजांची प्रमुख उपस्थिती\nवृद्ध व अपंग भाविकांसाठी लिफ्ट सुविधा\nमुक्कामी भाविकांसाठी भक्तनिवास खोल्यांची वाढ\nनाथभक्तांच्या वाहन सुरक्षिततेसाठी पार्किंग सुविधा\nनाथभक्तांच्या चहा व नाष्ट्यासाठी अद्ययावत कॅन्टीन सुविधा\nनाथभक्तांच्या निवारा सुविधेसाठी यात्री निवारा मंडप\nपरिसरातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय व वाचनालय सुविधा\nदररोज सकाळी ११ ते २ व रात्री ०९ ते १० या वेळेत मोफत महाप्रसाद\nपरिसरातील शालेय विद्यार्थीनींसाठी पाथर्डी व तिसगाव येथे शिक्षणासाठी मोफत बस सुविधा\nनाथभक्तांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण मंदिर परिसर सिसिटीव्हीच्या देखरेखी मध्ये\nगरिबांच्या लग्न सोहळ्यासाठी माफक दरामध्ये बहुउद्देशिय सभामंडप\nभाविकांना माफक दरामध्ये लाडू व रेवडी प्रसादालय\nमंदिर परिसरामध्ये लॉन व गार्डन\nअनुष्ठान भक्तांसाठी भव्य असा निवारा हॉल\nहोमहवन व अभिषेक पूजा सुविधा\nअतितातडीच्या आरोग्य सुविधेसाठी रुग्णवाहिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://granthali.com/product/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%80-sant-tukobanchi-rojnishi/", "date_download": "2018-08-18T08:32:54Z", "digest": "sha1:32PKH5HZV3IQML65UKE3CQ4QGB2FQPGP", "length": 5824, "nlines": 163, "source_domain": "granthali.com", "title": "संत तुकोबांची रोजनिशी (Sant Tukobanchi Rojnishi) | Granthali", "raw_content": "\nHome / आध्यात्मिक / संत तुकोबांची रोजनिशी (Sant Tukobanchi Rojnishi)\nशहर आत्महत्या करायचं म्हणतंय...\nसूर्य होता रात्रीला ₹500.00 ₹300.00\nतुकोबांनी अध्यात्मज्ञान गावरानभाषेत सांगितले. त्यामधून स्वत:चे आयुष्य लोकांसमोर उघड केले. गीतेच्या भाष्याऐवजी नामभक्ती शिकवली. देवाचे स्वरूप समजण्यास ही ‘संत तुकोबांची रोजनिशी’ उपयुक्त ठरेल. संत होण्यापूर्वी तुकाराम बराच काळ अनेक व्यक्तिमत्त्वांच्या रूपाने आपल्यासमवेत राहतात. त्यांच्या अनुभवांनी आपण आपल्याला तपासतो. ते आपले मित्र होतात आणि सल्ला देतात. ‘आपुलाचि संवाद’ आपणाला सांगतात. आपल्याबरोबरीने चालतात, बोलतात, विचार करतात. ते विचारप्रक्रियेने ज्ञानी होतात. त्यानंतर हळुवार पावलापावलाने आपल्यापासून दुरावतात. ‘परदेशी’ होतात.\nमी हिंदू झालो ज्ञानेश्वरीवर आधारित निबंध (Me Hindu Jhalo)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/saathchal-wari-palkhi-varkari-health-service-ready-129965", "date_download": "2018-08-18T08:51:21Z", "digest": "sha1:3K4VK4ABNY4WSM3HCCGUNEB7ESPGFXLN", "length": 14995, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "#SaathChal Wari Palkhi Varkari Health service ready #SaathChal पालखीतील वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवा सज्ज | eSakal", "raw_content": "\n#SaathChal पालखीतील वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवा सज्ज\nगुरुवार, 12 जुलै 2018\nलोणंद - श्री संत ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवानराव पवार, खंडाळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत बागडे यांनी दिली.\nलोणंद - श्री संत ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवानराव पवार, खंडाळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत बागडे यांनी दिली.\nपालखी सोहळा येथे शुक्रवारी (ता. १३) दीड दिवसाच्या मुक्कामासाठी येत आहे. सोहळ्यातील वारकरी आणि भाविकांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाने सर्व ती जय्यत तयारी केली आहे. वारकरी\nव भविकांना शुद्ध व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यासाठी पालखी मार्गावरील १९ विहिरींच्या पाण्याचे तसेच टी. सी. एल. चे नमुने सातारा येथील प्रयोगशाळेत तपासण्यात आले आहेत. कालपासून (ता. दहा) पाणी शुद्धीकरणासाठी कर्मचाऱ्यांच्या पाच पथकांची नियुक्ती केलेली आहे.\nजलशुध्दीकरणासाठी टी. सी. एल. व मेडिक्‍लोअरचा पुरेशा प्रमाणात\nसाठाही उपलब्ध करण्यात आला आहे. पाडेगाव व लोणंद येथे दहा\nठिकाणी पाण्याचे टॅंकर भरून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.\nत्याच्या नियंत्रणासाठी ३४ कर्मचाऱ्यांची नऊ पथके तैनात ठेवली आहेत.\nभाविकांना २४ तास आरोग्य सेवा पुरवण्यासाठी चार वैद्यकीय पथकांमध्ये ३३ वैद्यकीय अधिकारी, १३ औषध निर्माण अधिकारी, १७ आरोग्य सहायक, दोन आरोग्य सहायिका, ४२ आरोग्य सेवक, ३० आरोग्य सेविका व ८ शिपाई कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सर्व प्रकारच्या औषधांची मागणी करून औषधांचा\nसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून ठेवला आहे. लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रातील तपासणी प्रयोगशाळा ३४ तास कार्यान्वित ठेवण्याची व्यवस्था केली आहे. पालखी तळावर एक, लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात एक, माउलींचे नीरा नदी स्नान येथे एक अशा एकूण तीन रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आपत्तीकालीन स्थिती उद्‌भवल्यास टोल फ्री क्रमांक - १०८ व १०२ या दूरध्वनी या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही डॉ. बागडे यांनी केले आहे.\nवारकऱ्यांना व भाविकांना तातडीने आरोग्यसेवा मिळावी यासाठी या वर्षी पालखीतळावर आरोग्यदूत वारकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यरत राहणार आहेत. त्यांना केसरी ड्रेसकोड देण्यात आला असून, प्राथमिक उपचार किट (फस्टेड बॉक्‍स) देण्यात येणार आहे. हे आरोग्यदूत वारकऱ्यांना तातडीची आरोग्य सेवा देण्याबरोबर आरोग्यविषयक जागृतीही करणार असल्याची माहिती डॉ. बागडे यांनी दिली.\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी\nसंत तुकाराम महाराज पालखी\nसंग्रामपूर : वाण धरण ६५ टक्के भरले\nसंग्रामपूर : सातपुडा पर्वतामधील तीन जिल्ह्यांसाठी जलसंजीवनी ठरलेले वाण धरण 65 टक्के भरले आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या ...\nबारामती - विद्या प्रतिष्ठानच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पुरस्कार\nबारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट...\nपंकज भूसे यांचा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव\nसरळगांव - महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी होऊन दिलेल्या उद्दिष्टा पेक्षा जास्त वृक्ष लागवड करून उत्कृष्ट कामगिरी केल्याने...\nघरकामगार, बांधकाम मजूर महिलांची उपेक्षाच\nजळगाव : दिवसरात्र काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, पण डोक्‍यावर हक्काचं छत नाही...सतत कष्ट करूनही पदरी काहीच न पडल्यामुळे अनेकदा उपवास...\nगिरणा धरणात 31 टक्के पाणीसाठा\nपिलखोड (ता. चाळीसगाव) : हरणबारी धरणापाठोपाठ गुरूवारी (ता. 16) केळझर धरणदेखील ओव्हरफ्लो झाले. चणकापूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे त्यातूनही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/e-connectivity-130853", "date_download": "2018-08-18T08:51:33Z", "digest": "sha1:7HA6APXZAXNG27JDMMGHPS4SXDEKUEYW", "length": 15528, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "e-connectivity आता प्रत्येक पुणेकरासाठी ई-कनेक्‍टिव्हिटी | eSakal", "raw_content": "\nआता प्रत्येक पुणेकरासाठी ई-कनेक्‍टिव्हिटी\nसोमवार, 16 जुलै 2018\nपुणे - रस्त्यावरून चालताना तुमच्या मोबाईलमधील इंटरनेट वापरण्याची गरज नाही. प्रत्येक पुणेकराला स्मार्ट सिटीमध्ये वाय-फायचे कनेक्‍शन मोफत मिळेल. इतकेच नाही, तर स्मार्ट टॉयलेट, स्मार्ट बस स्टॉप आणि शहराचे डिजिटल मॅप चौका-चौकांत असतील. स्मार्ट सिटी कंपनी किंवा महापालिकेला एक रुपयाचीही गुंतवणूक न करता हा प्रकल्प राबविता येणार आहे अन्‌ त्यासाठी राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय कंपन्याही सरसावल्या आहेत. आता फक्त महापालिकेने मंजुरी दिली, तर पुढील महिनाअखेरीस प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकते.\nपुणे - रस्त्यावरून चालताना तुमच्या मोबाईलमधील इंटरनेट वापरण्याची गरज नाही. प्रत्येक पुणेकराला स्मार्ट सिटीमध्ये वाय-फायचे कनेक्‍शन मोफत मिळेल. इतकेच नाही, तर स्मार्ट टॉयलेट, स्मार्ट बस स्टॉप आणि शहराचे डिजिटल मॅप चौका-चौकांत असतील. स्मार्ट सिटी कंपनी किंवा महापालिकेला एक रुपयाचीही गुंतवणूक न करता हा प्रकल्प राबविता येणार आहे अन्‌ त्यासाठी राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय कंपन्याही सरसावल्या आहेत. आता फक्त महापालिकेने मंजुरी दिली, तर पुढील महिनाअखेरीस प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकते.\nसंपूर्ण शहरात मोफत वाय- फाय, स्मार्ट टॉयलेट्‌स, ई- वाहनांसाठी चार्जिंग डॉक, शहराचा डिजिटल मॅप आदी बहुविध प्रकल्प आता नागरिकांसाठी एका क्‍लिकवर खुले होऊ शकतात. स्मार्ट सिटी कंपनीने त्यासाठी ई- कनेक्‍टिव्हिटी प्रकल्प तयार केला असून, मंजुरीसाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला सादर केला आहे. मंजुरीची प्रक्रिया वेळेत झाली, तर अवघ्या ४५ दिवसांत प्रकल्पाचे काम सुरू होईल.\nप्रकल्पाची किंमत - सुमारे २२० ते २५० कोटी\n‘पीपीपी’द्वारे प्रकल्प - महापालिका, स्मार्ट सिटी कंपनीऐवजी संबंधित कंपनी सर्व गुंतवणूक करणार\nसहभागी कंपनीला मिळणारा परतावा\nई-कॉमर्स, स्मार्ट बसथांब्यांवरील जाहिरातींच्या महसुलातील काही भाग मिळणार\nकंत्राटाची मुदत १५ वर्षे\nई- कनेक्‍टिव्हिटी हा प्रकल्प यापूर्वी औंध, बाणेर, बालेवाडीमध्येच राबविण्याचे ठरविले होते. परंतु, त्याची प्रक्रिया सुरू केल्यावर संपूर्ण शहरात हा राबविता येईल, असे लक्षात आले. त्यामुळे प्रत्येक पुणेकराला डिजिटल कनेक्‍टिव्हिटी मिळणार आहे. शहर डिजिटल होण्यासाठी ही उत्तम संधी आहे. त्यासाठी स्मार्ट सिटीचा प्रयत्न सुरू आहे.\n- राजेंद्र जगताप, सीईओ, स्मार्ट सिटी कंपनी\nई - कॉरिडॉर - ई- कॉरिडॉरच्या माध्यमातून संपूर्ण शहरात सर्व रस्त्यांवर मोफत वाय-फाय सुविधा पुणेकरांना मिळणार\nस्मार्ट बस स्टॉप उभारणार ५०० ठिकाणी - डिजिटल बोर्डद्वारे वेळापत्रक, वाय-फाय सुविधा, बस स्‍टॉप आयटीएस सिस्टिमला जोडणार. शहराची, पीएमपीची संपूर्ण माहिती देणारी किऑस १०० बस स्टॉपवर\nस्मार्ट टॉयलेट (फ्रेश स्टॉप) होणार ५०० ठिकाणी - सोलरचा वापर, महिला- अपंगांसाठी उपयुक्त सुविधा, साबण- आरसे असणार, सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन आणि क्रशिंग आदी सुविधा\nस्मार्ट पोल उभारणार २००० ठिकाणी - एकाच पोलवर डिस्प्ले, सर्व प्रकारच्या केबल्स, वाय-फाय राऊटर्स, ई- वाहनांसाठी चार्जिंग डॉक, ३५० प्रमुख चौकांत उभारणार नेटवर्क केबल. आपत्तीमध्ये त्या पोलवरून संपूर्ण शहरात एकाच वेळी अनाऊन्समेंट शक्‍य. पोलपासून प्रत्येक ठिकाणी २५० मीटरवर मोफत वाय-फाय मिळणार.\nस्मार्ट डस्टबिन - ५०० ठिकाणी\nस्मार्ट मॅप असणार ५०० ठिकाणी - शहराचा स्मार्ट डिजिटल मॅप पुणेकरांना दिसणार\n#PuneTraffic पुणेकर आणखी पाच वर्षे वाहतूक कोंडीतच\nस्मार्ट सिटीच्या दिशेने पाऊल टाकलेल्या पुण्यात सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. परिणामी शहराला वाहतूक कोंडीचा रोज सामना करावा लागतोय, असे ३५ टक्...\nपुणे पोलिस दलाची पुनर्रचना\nशहरात आता पाच परिमंडळे, 30 पोलिस ठाणी पुणे - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर...\nबाणेर : बाणेर सारख्या स्मार्ट सिटीत डी मार्टच्या समोरील बाजूस रहादारीच्या रस्त्यालगत पदपथावरच झोपडपट्टी बांधल्या आहेत. याविरुध्द पीएमसीकडे...\nगुंतवणुकीसाठी अल्ट्रा शॉर्ट टर्म फंडचा पर्याय\nमुंबई - रिझर्व्ह बॅंकेने रेपो दर पाव टक्का वाढवल्यानंतर अल्प मुदतीतील परतावा वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अल्प मुदतीच्या डेट फंडांमधील...\nस्वच्छतेबाबत जागृत असणे काळाची गरज\nऔंध : औंध भाग हा स्मार्ट सिटीमध्ये सहभागी झाला. सर्व प्रकारचे कामे महापालिका प्रशासनाने करावे असे लोकांना अपेक्षीत असते. परंतु स्वतः मात्र काही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/eleventh-merit-list-admission-127893", "date_download": "2018-08-18T08:51:47Z", "digest": "sha1:KJ57QLX6EDZGYVEH4JX7MN5WKOHHZBHG", "length": 12275, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "eleventh merit list admission अकरावीची गुणवत्ता यादी आज | eSakal", "raw_content": "\nअकरावीची गुणवत्ता यादी आज\nमंगळवार, 3 जुलै 2018\nनागपूर - अकरावी प्रवेश प्रक्रियेतील द्विलक्षी अभ्यासक्रमाचे प्रवेश दुसऱ्या फेरीपासून बंद करण्यात आले. त्यामुळे आता कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी शाखेतील प्रवेश प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. उद्या, मंगळवारी (ता. ३) या सर्वच शाखांमधील जागांसाठी आलेल्या अर्जांनुसार गुणवत्ता प्रकाशित करण्यात येणार आहे.\nनागपूर - अकरावी प्रवेश प्रक्रियेतील द्विलक्षी अभ्यासक्रमाचे प्रवेश दुसऱ्या फेरीपासून बंद करण्यात आले. त्यामुळे आता कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी शाखेतील प्रवेश प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. उद्या, मंगळवारी (ता. ३) या सर्वच शाखांमधील जागांसाठी आलेल्या अर्जांनुसार गुणवत्ता प्रकाशित करण्यात येणार आहे.\nअकरावी प्रवेशासाठी मे महिन्यापासून प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरण्यास सुरुवात करण्यात आली. ८ जूनला दहावीचा निकाल लागल्यावर दोन दिवसांत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक घोषित करण्यात आले. यानुसार २५ जूनपर्यंत कला, वाणिज्य, विज्ञान आणि एससीव्हीसी शाखेतील जागांसाठी अर्जाचा दुसरा भाग भरण्यास सांगण्यात आले.\nयामध्ये कला शाखेसाठी १ हजार ८६२ अर्ज, वाणिज्यसाठी ८ हजार ४४१, विज्ञानसाठी १८ हजार ६७४ तर एमसीव्हीसी अभ्यासक्रमासाठी ४१७ अर्ज असे एकूण ३३ हजारांवर विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. उद्या, मंगळवारी (ता. ३) प्रवेशाची गुणवत्ता यादी प्रकाशित केली जाणार आहे. पाच जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविता येईल. सात जुलैला पहिल्या फेरीसाठी गुणवत्ता यादी प्रकाशित होऊन प्रवेशास सुरुवात होईल. दरम्यान, यावेळी गुणवत्ता यादी आणि प्रवेश यादीमध्ये कुठलाही घोळ होऊ नये याबद्दल काळजी घेण्यात यावी, अशी मागणी मुख्याध्यापक संघटनेकडून करण्यात आली आहे.\nद्विलक्षी अभ्यासक्रम (रिक्त जागा) - ५,०८६\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nरावेतला स्वतंत्र पोलिस चौकीची मागणी\nवाल्हेकरवाडी - रावेत परिसराचा विकास झपाट्याने वाढत आहे, त्याचप्रमाणे गुन्हेगारीही वाढत आहे. रावेत परिसरात गुन्हा घडला अथवा काही कारणास्तव पोलिस...\nघरकामगार, बांधकाम मजूर महिलांची उपेक्षाच\nजळगाव : दिवसरात्र काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, पण डोक्‍यावर हक्काचं छत नाही...सतत कष्ट करूनही पदरी काहीच न पडल्यामुळे अनेकदा उपवास...\nवाहून गेलेला तरुण तीस तासांनंतरही सापडेना\nजळगाव ः येथील अयोध्यानगराजवळील नाल्याला काल झालेल्या पावसामुळे पूर आला होता. या पुरात इतर नागरिकांना मदत करणारा तरुण पाय घसरून नाल्यात पडून वाहून...\nडिजिटायझेशन'ने दुर्मिळ ग्रंथही चिरकाल \nजळगाव ः पुस्तकांचा खजिना सांभाळणाऱ्या अनेक वाचनालयांना शतकोत्तरी परंपरा लाभलेली आहे. परंतु काळानुरूप ग्रंथालयांनी तंत्रज्ञानाशी जुळवून, त्या दिशेने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahaforest.gov.in/booklet_page.php?lang_eng_mar=Mar&cid=21", "date_download": "2018-08-18T08:59:43Z", "digest": "sha1:5SDWR2RBS3B3NOPLBV4S7KG6S2IB5TCA", "length": 4543, "nlines": 136, "source_domain": "mahaforest.gov.in", "title": " Maharashtra Forest Department", "raw_content": "\nमाहिती अधिकार / सेवा योग्य\n- उपग्रह आधारीत सनियंत्रण\n- संयुक्‍त वनव्‍यवस्‍थापन (अ.नि.व.वि.)\nहे करा आणि करु नका\nतेंदु आणि आपटा पाने\n- कायदे, नियम व संहिता\n- वन संरक्षण - राज्यस्तरीय समिती\n- मानव संसाधन व्‍यवथापन\n- मानव संसाधन व्‍यवथापन\nभारतीय वन सेवा प्रोफाइल\nभारतीय वन सेवा अपार\nमहाराष्‍ट्र वन सेवा प्रोफाईल\n- मध्य वन ग्रंथालय\n- मानद वन्‍यजीव रक्षक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://punerispeaks.com/violence-near-bhima-koregaon-koregaon-battle-anniversary-event/", "date_download": "2018-08-18T08:38:45Z", "digest": "sha1:QTDJWUMKO7XVMIQZWX35HCVX5F3STTZ2", "length": 7427, "nlines": 92, "source_domain": "punerispeaks.com", "title": "भीमा कोरेगाव येथे झालेला प्रकार अशोभनीय : शरद पवार", "raw_content": "\nभीमा कोरेगाव येथे झालेला प्रकार अशोभनीय : शरद पवार\nभीमा कोरेगाव येथे झालेला प्रकार अशोभनीय आहे. या संदर्भात सामंजस्याची भूमिका घेऊन कुठलेही प्रक्षोभक भाष्य न करता सामाजिक सलोखा कायम राहील, याची दक्षता घ्यावी, असे अवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज केले.\nभीमा-कोरेगावला दरवर्षी लोक जात असतात. आजपर्यंत कधीही तिथे स्थानिकांसोबत संघर्ष झालेला नाही. यावेळी २०० वर्ष झाल्यानिमित्त तिथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील, ही कल्पना होतीच. त्या ठिकाणी या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तींनी घेतला असावा. काही हिंदुत्ववादी संघटनांनी पुणे शहरातून येऊन तीन-चार दिवसांपासूनच चिथावणी देण्याची भूमिका घेतल्याचे येथील ग्रामस्थ सांगत आहेत. पोलिसांनी याबाबत केसेस दाखल केल्या आहेत. मात्र बाहेरून आलेले लोक करून गेले आणि ज्यांचा काही संबंध नाही अशा स्थानिक ग्रामस्थांवर केसेस दाखल केल्या गेल्या अशी गावकऱ्यांची तक्रार आहे.\nत्यामुळे दोन-तीन दिवस आधीपासूनच इथे अस्वस्थतेचे वातावरण होते. लाखांहून अधिक लोक जमा होणार असताना मला वाटतं आधीच खबरदारी घ्यायला हवी होती. ती न घेतल्यामुळेच आणि अफवा, गैरसमज अधिक पसरल्यामुळे हा प्रकार घडला आहे.\nनांदेड जिल्ह्यातील एका तरुणाचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी याबाबतीत लगेच काळजी घेतली ते बरं झालं. नाहीतर त्याला जातीय स्वरूप आले असते. मृत्युमुखी पडणारा कुणीही असो.. पण हे प्रकरण चिघळू द्यायला नको. जे घडले त्याची चौकशी राज्य सरकारने करावी. जे सार्वजनिक क्षेत्रात काम करतात त्यांनी हे पसरू न देण्याची भूमिका घ्यायला हवी.\nघडलेला प्रकार शोभादायक नाही. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील लोकांनी सामंजस्याने व संयमाने कोणतेही प्रक्षोभक भाष्य न करता योग्य प्रकारे ही परिस्थिती हाताळणे आवश्यक आहे, असे माझे आवाहन आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.\nशरद पवार यांच्या कारकिर्दीचा आढावा….\nPrevious articleमराठी भाषा पंधरवडा ला ट्विटर वर सुरुवात\nNext articleशाहरुख सूत्रसंचालन करीत असलेल्या टेड टॉक्स मध्ये बोलण्यासाठी एकता कपूर ची विचित्र अट\nAsian Games 2018: आशियाई क्रीडा स्पर्धा वेळापत्रक, प्रक्षेपण, कबड्डी संघ वेळापत्रक\nपिंपरीत प्रियकराने ‘Shivde, I Am Sorry’ चे ३०० फलक लावले, कोण आहे शिवडे\nअटल बिहारी वाजपेयी माहिती, अटल बिहारी वाजपेयी विशेष , अटल बिहारी वाजपेयी मराठी, अटल बिहारी वाजपेयी कविता\nपुणे तिथे काय उणे: देशात राहण्यासाठी पुणे शहर अव्वल स्थानी\nआरक्षण – एक शोधनिबंध | आरक्षण माहिती | आरक्षण म्हणजे काय\nRaj Thackeray VS Ajit Pawar: पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळ्यात एकमेकांवर टीका, वॉटरकप 2018 विजेते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://sanvaad.blogspot.com/2008/02/blog-post_3577.html", "date_download": "2018-08-18T08:35:32Z", "digest": "sha1:TC64KBVQTG5I7PISV56M3B4WDSI6RVPW", "length": 7995, "nlines": 177, "source_domain": "sanvaad.blogspot.com", "title": "संवाद: अजून एक चित्र", "raw_content": "\nमाझ्या मनातला सातत्याने चाललेला विचारांचा प्रवास...माझ्यातल्या चाकोरीबाहेरच्या नव्या जाणिवा, नव्या सृजनाची जाण...त्याची अभिव्यक्ति म्हणजेच हा संवाद...मर्मबंधातली ठेव ही\nसध्ध्या माउस वापरून, चित्र काढून पहायचा छंद लागलाय बहुधा हे पण अळवावरचं पाणीच असणार बहुधा हे पण अळवावरचं पाणीच असणार :D एक न धड, भाराभर चिंध्या, हेच खर :D एक न धड, भाराभर चिंध्या, हेच खर असो. (कोकणातल्या व्यक्तिला अळवाची आठवण नाही येणार, तर कोणाला असो. (कोकणातल्या व्यक्तिला अळवाची आठवण नाही येणार, तर कोणाला\nमायबोलीवरील एका स्नेह्यांनी, रेषांच्या बदलाने एकच चित्र कसे वेगळे वाटू शकते, ते दाखवण्यासाठी ह्या चित्रात काही बदल केले. ते हे बदललेले चित्र.\nसंवादिनी, धन्यवाद :) काय खेचते आहेस का माझी :) मूडात दिसतेस :) मिशिवालं पावणं भ्येटलं जणू\nयशोधरा, तू पण ’मिशिवालं पावनं’ भाषा बोलतेस ना त्यावरून मला बऱ्याचदा डाऊट येतो की तूच सर्किट नावाने लिहीतेस की काय तुमच्या दोघांची लिहायची स्टाईल खूपच सेम आहे. ;-)\nमी आजकाल खूप कमी असते ब्लॉगिंगवर.. पण तुझी सगळी पोस्ट्स आवडलीत मला.\nसामवेद, :) अशी दिसते का ती\nअनामिका, पोस्ट्स आवडल्याच सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद :) तू बंगळुरुलाच असतेस\nआणि नाही, सर्किट ह्या नावाने मी लिहीत नाही, ती वल्ली वेगळीच आहे ;-) बाकी तू सर्किटला मस्त कॉंप्लिमेंट दिलीस हां काय सर्किटसाहेब\nकुणी लेकानं पाहीलय तिला\nतर, धन्यवाद संवेद अन जास्वंदी :)\nकाय कातिल डोळे आलेत :)\nकोण ही कुठे ही\nश्यामली, स्नेहा, अभिजित, मीनू, आणि अनामिक (जे कोणी असाल ते), सार्‍यांचेच आभार :)\nसना हे नाव खूपच आवडत मला\nचित्र मस्त काढले आहेस ग, डोळे तर खुपच छान जमले आहेत.\nनॅशनल जिओग्राफीच्या कव्हरवरच्या त्या अफगाण मुलीची आठवण झाली. तो अंक खूप जुना आहे. अलीकडेच चार-पाच वर्षांपूर्वी वगैरे त्या मुलीचा शोध पुन्हा घेतला गेला. ती मिळाली, तिचे छायाचित्र पुन्हा कव्हरवर आले होते. डोळ्यांतील बुब्बुळावरून तिचा शोध लावला गेला. इथे या चित्रातील डोळ्यांनी त्याची आठवण करून दिली.\nमाझिया मना जरा सांग ना\nप्रतिबिंब - आणि हा ब्लॉग बघणीय पण :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.blogspot.com/2018/", "date_download": "2018-08-18T09:14:25Z", "digest": "sha1:LO5WESRDTZWAHRGXXFD7GABDJJF5HTA7", "length": 18070, "nlines": 280, "source_domain": "aisiakshare.blogspot.com", "title": "ऐसी अक्षरे: 2018", "raw_content": "\nचोहीकडे जयघोष झाला बहोत खूब अन् वाहवा मैफलीत या रंग भरण्या 'मंदार' हा आला पहा...\nब-याचदा आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळत नाही, म्हणून आपण निराश होतो. पण ती गोष्ट का मिळाली नाही याचा नीट विचार केला तर असं कळतं की, आपण चुकीच्याच दिशेला शोध घेत होतो. आपल्याला हवी असलेली गोष्ट जवळपासच होती, पण आपण दूर-दूर शोधत राहिलो.\nअशीच काहीशी गोष्ट आहे आदित्य आणि निशाची. आदित्य तसा हुशार आणि कष्टाळू मुलगा, पण सतत असमाधानी. आपल्याला हवं ते अजून मिळालंच नाही, काहीतरी राहून गेलंय, असं त्याला नेहमी वाटायचं. कितीही यश मिळालं तरी त्याला ते अपूर्णच वाटायचं.\nअशा आदित्यला भेटली निशा, थोडी बालिश, थोडी खोडकर; पण तेवढीच समजूतदार आणि प्रेमळही. कुणा कॉमन फ्रेन्डनं दिलेल्या पार्टीत दोघांची ओळख झाली आणि असमाधानी, अपूर्ण असा आदित्य नकळत निशाच्या मनमोकळ्या हास्याकडं, लाघवी बोलण्याकडं आकर्षित होत गेला.\nभेटी-गाठी, गप्पा-गोष्टी सुरु झाल्या आणि आदित्यला आयुष्याचा वेगळाच अर्थ उलगडत गेला. कामाशिवाय पाच मिनिटंही एका ठिकाणी न थांबणारा आदित्य, आता निशाची वाट बघत तासन्‌तास वेळ घालवू लागला. तिच्यासोबत भटकताना त्याच्या लक्षात आलं की आपण जन्मल्यापासून याच शहरात राहिलो, तरी खूप काही बघायचं राहिलंच होतं. विनाकारण इकडून-तिकडं, या रस्त्यावरुन, त्या रस्त्यावरुन फिरताना त्यानं खूप माणसं बघितली, त्यांची वेगवेगळी आयुष्यं बघितली. त्यांच्या अडचणी बघितल्या आणि तरीही त्यांचं आनंदात जगणं बघितलं. मग स्वतःच्या आयुष्याशी त्यांची तुलना करुन बघितली आणि त्याला जाणवलं की, आपल्याला जे हवंहवंसं वाटत होतं, ते कदाचित आपल्याच आजूबाजूला लपलंय.\nनिशाला भेटण्यापूर्वी आदित्यचं फ्रेन्ड सर्कल खूप लिमिटेड होतं. दुस-या कुणाचं फारसं ऐकून घेणंही त्याला जमत नसे. पण निशाचा एकही शब्द तो खाली पडू देत नव्हता. तिनं सांगितलेलं काम पूर्ण झालंच पाहिजे, यासाठी तो जिवाचा आटापिटा करु लागला. आणि हळूहळू त्याला स्वतःच्याच छुप्या क्षमता लक्षात येऊ लागल्या. पूर्वी कधी प्रयत्नही न केल्यानं त्याला ज्या गोष्टी जमणार नाहीत असं वाटायचं, त्या सगळ्या गोष्टी आता तो मजेत करु लागला. आणि आपल्याला हे जमलं याचं समाधान त्याच्या चेह-यावर झळकू लागलं. त्याच्या कपाळावरच्या आठ्या गायब झाल्या आणि त्याच्या गालावर मात्र वरचेवर खळी दिसू लागली.\nनिशाला भेटण्यामागं आदित्यचा कसलाही खास उद्देश नव्हता. जे झालं ते सगळं दोघांच्याही नकळत, काहीच न ठरवता. पण निशानं त्याच्या आयुष्यात प्रवेश करताच त्याचं आयुष्य बदलून गेलं. तो हसायला शिकला. समाधानी रहायला शिकला. त्याला आता काहीतरी मिळाल्यासारखं वाटू लागलं. अपूर्णतेची भावना निघून गेली आणि आयुष्य संपूर्ण वाटू लागलं…\nआज निशाला भेटायला निघाला तेव्हा त्यानं रेडीओवर हे गाणं ऐकलं. आदित्यला वाटलं, हे गाणं खास त्याच्यासाठीच लावलं होतं जणू गाणं गुणगुणतच त्यानं फ्लॅटचं मेन डोअर लॉक केलं आणि पाय-या उतरत पार्किंगकडं निघाला…\nआशियाना मेरा, साथ तेरे है ना\nढूँढते तेरी गली, मुझको घर मिला..\nआ-बो-दाना मेरा, हाथ तेरे है ना\nढूँढते तेरा खुदा, मुझको रब मिला..\nतू जो मिला, लो हो गया मैं काबिल\nतू जो मिला, तो हो गया सब हासिल\nमुश्किल सही, आसाँ हुई मंजिल..\nक्यूँकी तू धडकन, मैं दिल…\n\"संजू\" - एक नंबर पिक्चर बनवलाय राजकुमार हिरानीनं.\nरणबीर, विकी कौशल, अनुष्का, परेश रावल, दिया मिर्झा, बोमान इरानी, सोनम कपूर, सयाजी शिंदे, पियुष मिश्रा... सगळ्यांनी मस्त काम केलंय.\nचांगल्या सिनेमासाठी लागणा-या सगळ्या गोष्टी आहेत ह्यात - गाणी, म्युझिक, मसाला, दोस्ती - यारी, फॅमिली व्हॅल्यूज, डबल-मिनींग जोक्स, सामाजिक संदेश, 'आई तुझं लेकरु' पासून 'कर हर मैदान फतेह' पर्यंतचा प्रवास वगैरे वगैरे... ज्याला जे घ्यायचंय ते त्यानी घ्यावं - पॉझिटीव्ह, निगेटीव्ह, मोटीव्हेटींग, डिस्गस्टींग, काहीही...\nनक्की बघा मित्रांनो, अजिबात चुकवू नका...\nहां, आणि पिक्चर बघून झाल्यावर फेसबुक/व्हॉट्सऐपवर संजय दत्तला शिव्या घाला मनसोक्त... सगळ्यांसारख्या... म्हणजे नंतर मनात कसला गिल्ट नको रहायला... फक्त एवढं लक्षात असू द्या -\nहमको जो ताने देते हैं, हम खोए हैं इन रंगरलियों में..\nहमने उनको भी छुप-छुपकर आते देखा इन गलियों में...\n- मंदार शिंदे 9822401246\nते पेटवू म्हणाले... (मभा)\nते पेटवू म्हणाले... (मभा)\nLabels: Handwriting, मभा, मराठी, संग्रह, सुलेखन\nLabels: मराठी, लेख, सुलेखन\nपेपर बॅग कशा बनवायच्या\nरद्दीतल्या वर्तमानपत्रापासून पर्यावरणस्नेही (इको-फ्रेंडली) पेपर बॅग कशा बनवायच्या\nही सोपी पद्धत शिका शंतनुकडून... कापणं नाही, चिकटवणं नाही, फक्त घड्या घालून बनवा बॅग...\nप्लॅस्टीक बॅगचा वापर टाळा... त्याऐवजी पेपर बॅग वापरा, रद्दीतल्या वर्तमानपत्रांचा चांगला उपयोग करा, घरीच बनवलेली पेपर बॅग पुन्हा-पुन्हा वापरत रहा...\nकॅमेरा व एडीटींगः मंदार शिंदे\nपेपर बॅग कशा बनवायच्या\nबरंच काही... (स्पृहा जोशी)\nबरंच काही... (स्पृहा जोशी)\nLabels: कविता, मराठी, सुलेखन\nLabels: कविता, मराठी, संग्रह, सुलेखन\nया वयात आरशात पाहणे... - म. भा. चव्हाण\nया वयात आरशात पाहणे... - म. भा. चव्हाण\nLabels: कविता, मभा, मराठी, संग्रह, सुलेखन\nऐक माधवा... - प्रसाद कुलकर्णी\nऐक माधवा... - प्रसाद कुलकर्णी\nLabels: कविता, मराठी, संग्रह, सुलेखन\nकविता लोभसवाणी - प्रसाद कुलकर्णी\nकविता लोभसवाणी - प्रसाद कुलकर्णी\nLabels: कविता, मराठी, संग्रह, सुलेखन\nध्यान - डॉ. अभय बंग\nध्यान - डॉ. अभय बंग\nLabels: मराठी, संग्रह, सुलेखन\nLabels: संग्रह, सुलेखन, हिंदी\nLabels: मराठी, संग्रह, सुलेखन\nया ब्लॉगवरील नवे लिखाण ई-मेलद्वारे मिळवाः\nते पेटवू म्हणाले... (मभा)\nपेपर बॅग कशा बनवायच्या\nबरंच काही... (स्पृहा जोशी)\nया वयात आरशात पाहणे... - म. भा. चव्हाण\nऐक माधवा... - प्रसाद कुलकर्णी\nकविता लोभसवाणी - प्रसाद कुलकर्णी\nध्यान - डॉ. अभय बंग\nया ब्लॉगवरचे विचार आणि शब्द मुक्त आहेत. तुम्ही वाचा आणि इतरांनाही वाचू द्या. - मंदार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/balala-dudh-kase-pajave", "date_download": "2018-08-18T08:17:40Z", "digest": "sha1:V7N5PCQTRTAS3QMEL2GQ6W7TI3X4HQQZ", "length": 13384, "nlines": 219, "source_domain": "www.tinystep.in", "title": "बाळाला कश्याप्रकारे दूध पाजाल ? - Tinystep", "raw_content": "\nबाळाला कश्याप्रकारे दूध पाजाल \nसुरुवातीला बाळ दूध खूपच कमी पिते पण नंतर थोडय़ाच दिवसांत ३० ते ६० मिली दूध पिऊ लागते. दुधाचा पहिला भाग पातळ, तहान भागवणारा असतो. नंतरचा भाग दाट, उष्मांक असलेला, स्निग्ध आणि भूक भागवणारा असतो. स्तनपान बाळाला सुखकारक आणि सुलभ होण्यासाठी आईने काळजी घ्यावी. अगोदर बाथरूममध्ये जाऊन यावे, भरपूर पाणी पिऊन घ्यावे, पाठीला आणि कमरेला आधार व आराम वाटेल अशा उशांना (pillow) टेकून बसावे. जर तुम्ही खुर्चीवर बसला असाल तर तुमच्या पायाखाली छोटेसे स्टूल घ्या. मांडीवर उशी घेऊन बाळाला त्यावर पूर्ण स्वत:कडे वळवून घ्यावे. यासाठी आता बाजारात विशिष्ट नर्सिग पिलोसुद्धा मिळतो. स्तनाग्रावर बाळाला व्यवस्थित घ्यावं.\nबाळाला व्यवस्थित दूध पिता येईल त्यासाठी कशी शरीररचना करता येईल ही गोष्ट अनुभवी सुईणी, घरातील ज्येष्ठ स्त्रिया यांची मदत घ्यावी. बाळाला दूध पाजणे एक तंत्रच आहे. आणि हळूहळू तुम्हाला जमू लागेल.\nप्रत्येक बाजूला १० ते १५ मिनिटे घ्यावीत. एका बाजूला पिऊन झाल्यानंतर बाळाला खांद्यावर घेऊन ढेकर काढावी. दुसऱ्या बाजूनंतर पुन्हा तसंच करावं म्हणजे बाळाला दूध नीट पचून, वर येत नाही किंवा पोट दुखणार नाही. दूध पिता- पिता बाळ मधेच झोपुन जाते. त्याला हलकी चापट मारून जागे करून घ्यावं. बाळ जर चुकीच्या पोझिशनने दूध प्यायला लागले तर आईला त्रास होऊ शकतो.\nनवजात बाळ दिवसातून ८ ते १२ वेळा किंवा जास्त वेळाही दूध पिऊ शकतो. प्रत्येक वेळी ३० ते ४० मिनिटं. आईने दूध पाजण्याव्यतिरिक्त फक्त स्वत:चं खाणंपिणं आणि विश्रांती एवढंच करायचं आहे. मुख्य म्हणजे यासाठी भरपूर वेळ आणि संयम बाळगावा. कारण आई बाळ दोघेही नवीन आहेत. सुरुवातीला अडचणी आल्या तरी हळूहळू जमतं. दूध भरपूर यावं म्हणून आपल्याकडे काही पारंपरिक गोष्टींचं सेवन करायला सांगतात- शतावरी, मेथी, डिंक, खसखस, हळीव इत्यादी. पण त्याहून महत्त्वाचं आहे तीन वेळा ताजं जेवण, दूध, भरपूर पाणी आणि तणावरहित मानसिकता.\nस्तनपानाचे फायदे हळूहळू आईला दिसू लागतात. आईसाठी चांगली गोष्ट म्हणजे रोज किमान ५०० कॅलरीज जाळल्या जातात. गरोदरपणात वाढलेलं वजन झपाटय़ानं कमी होत. गर्भाशय पूर्वीच्या आकाराला परत येतं. मासिक पाळी लवकर सुरू होत नाही. त्यामुळे नैसर्गिकपणे संततीनियमन होतं. पुढच्या आयुष्यात स्तनांचा, ओव्हरीजचा कॅन्सर आणि हाडं ठिसूळ होणे. यापासून संरक्षण मिळतं. यातून महत्त्वाचा फायदा म्हणजे या अत्यंत निकटच्या संबंधांमुळे आई-बाळात एक अतूट बंधन निर्माण होतं.\nआईच्या दुधावर बाळाची वजनवाढ चांगली होते. त्याला जुलाब किंवा ‘खडा’ होणं हे दोन्ही त्रास कमी होतात. अ‍ॅलर्जी, इसब, दमा यांची शक्यता कमी असते. कान, छाती किंवा पोटाचा जंतुसंसर्ग कमी होतो. अशा बाळांचा बुद्धय़ांकसुद्धा चांगला असतो. मोठेपणी स्थूलपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा रोगांची शक्यताही कमी असते.\nयाखेरीज स्तनपान खरोखर फार सोयीस्कर आहे. हवं तेव्हा, हवं तितकं, बाटल्या किंवा इतर गोष्टींचं र्निजतुकीकरण हे काम वाचतं. फॉम्र्युला किंवा वरच्या दुधाचा खर्च कमी येतो. आजारपण कमी असल्यानं वैद्यकीय खर्चपण वाचतो. ज्या आईला कामासाठी बाहेर जायचंय तिला ‘ब्रेस्ट पंप’चा पर्यायही उपलब्ध आहे.\nअर्थात स्तनपानाचे फायदे वाचून असं वाटू नये की स्तनपान जमलं नाही तर बाळाचं फार मोठं नुकसान होणार. आणि जर तुम्हाला तसे वाटत नसेल तर स्तनपानसाठी काय खावे याविषयी मागे आम्ही लेख दिले आहेत वाटल्यास ते बघू शकता. नाहीतर बाळाला स्तनपान मिळाले नाही तर आईच जबाबदार राहील.\nआज बाजारात नवीन उत्पादनामुळे नवीन आई-वडील स्तनपान पेक्षा त्या उत्पादनाला महत्व देतात पण आईचं दूध म्हणजे बाळाचं सर्वागीण पोषण.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7/", "date_download": "2018-08-18T08:44:52Z", "digest": "sha1:KJC2JKCWVYBEFWR4F2BW4ORH4DQREKKL", "length": 26537, "nlines": 146, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "अनिरुद्ध - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nगत ५ वर्षों से श्रद्धावान महिलाएँ परमपूज्य सद्गुरु श्री (अनिरुद्ध) बापू के मार्गदर्शन में हर्षोल्लास के साथ ‘श्रीमंगलचण्डिका प्रपत्ती’ कर रही हैं ‘प्रपत्ती’ यानी आपत्तिनिवारण करनेवाली शरणागति ‘प्रपत्ती’ यानी आपत्तिनिवारण करनेवाली शरणागति जैसा कि बापू ने कहा है, ‘श्रीचण्डिका उपासना’ यह रामराज्य के लिए सबसे महत्वपूर्ण है जैसा कि बापू ने कहा है, ‘श्रीचण्डिका उपासना’ यह रामराज्य के लिए सबसे महत्वपूर्ण है बापू के कहेनुसार, माँ जगदम्बा की, महिषासुरमर्दिनी की उपासना करने पर ही अशुभ का नाश हो जाता है, अशुभ दूर हो जाता है और यश एवं पराक्रम की प्राप्ति होती है और वे अबाधित रहते हैं बापू के कहेनुसार, माँ जगदम्बा की, महिषासुरमर्दिनी की उपासना करने पर ही अशुभ का नाश हो जाता है, अशुभ दूर हो जाता है और यश एवं पराक्रम की प्राप्ति होती है और वे अबाधित रहते हैं ‘श्रीमंगलचण्डिका प्रपत्ती’ यह माता चण्डिका (दुर्गामाता) की उपासना ही है ‘श्रीमंगलचण्डिका प्रपत्ती’ यह माता चण्डिका (दुर्गामाता) की उपासना ही है यह प्रपत्ती करते समय, बापू के बतायेनुसार पूजन की रचना की जाती है यह प्रपत्ती करते समय, बापू के बतायेनुसार पूजन की रचना की जाती है रचना के उपर, थाली में महादुर्गा के यानी ‘मोठी आई’ के पदचिन्ह हल्दी और कुंकुम से आरेखित किये जाते हैं रचना के उपर, थाली में महादुर्गा के यानी ‘मोठी आई’ के पदचिन्ह हल्दी और कुंकुम से आरेखित किये जाते हैं उसकी चारों ओर से ही श्रद्धावान महिलाएँ पूजन, आरती तथा गजर करती हैं\nप्रपत्तीपरिसर के माहौल को अधिक ही मंगलमय एवं आल्हाददायी बनाती है, वे परमपूज्य सद्गुरु की तसवीर की चहुँ ओर बनाये गयी फूलों की सुंदर सजावट तथा विभिन्न प्रकार की रंगोलियाँ श्रद्धावान महिलाएँ उपासना केन्द्रों में बड़ी तादात में एकत्रित होकर हर्षोल्लास के साथ प्रपत्ती मनाती हैं श्रद्धावान महिलाएँ उपासना केन्द्रों में बड़ी तादात में एकत्रित होकर हर्षोल्लास के साथ प्रपत्ती मनाती हैं विदेश में रहनेवालीं कुछ श्रद्धावान महिलाएँ तो ४ डिग्री टेंपरेचर में भी हर साल आनंद एवं उत्साह के साथ प्रपत्ती मनाती हैं\n‘माँ चण्डिका यानी ‘मोठी आई’ हमें ‘श्रद्धावान सैनिक’ के रूप में तैयार कर ही रही है’ इस दृढ़ विश्वास के साथ हर साल श्रद्धावान महिलाएँ प्रपत्ती की तैय्यारियाँ करती हैं\nगत ५ वर्षों से श्रद्धावान महिलाएँ परमपूज्य सद्गुरु श्री (अनिरुद्ध) बापू के मार्गदर्शन में हर्षोल्लास के साथ ‘श्रीमंगलचण्डिका प्रपत्ती’ कर रही हैं ‘प्रपत्ती’ यानी आपत्तिनिवारण करनेवाली शरणागति ‘प्रपत्ती’ यानी आपत्तिनिवारण करनेवाली शरणागति जैसा कि बापू ने कहा है, ‘श्रीचण्डिका उपासना’ यह रामराज्य के लिए सबसे महत्वपूर्ण है जैसा कि बापू ने कहा है, ‘श्रीचण्डिका उपासना’ यह रामराज्य के लिए सबसे महत्वपूर्ण है बापू के कहेनुसार, माँ जगदम्बा की, महिषासुरमर्दिनी की उपासना करने पर ही अशुभ का नाश हो जाता है, अशुभ दूर हो जाता है और यश एवं पराक्रम की\nअश्विन नवरात्रीतील सप्तमीचा दिवस ह्या दिवशी परमपूज्य बापूंच्या घरी मोठ्या आईचे “पराम्बा पूजन” केले जाते. ह्या वर्षीही हे पूजन नेहमीच्या उत्साही वातावरणात संपन्न झाले. बापू, नंदाई व सुचितदादांचे मोठ्या आईवरील नितांत प्रेम, तिच्या सहवासाची आणि तिला आळविण्याची नितांत आर्तता, ह्या सर्वांची अनुभूती ह्या दिवशी आम्ही सर्वांनी घेतली. मोठ्या आईच्या कृपेमुळे आम्हा काही श्रद्धावानांना हे सुंदर पूजन प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य लाभले आणि त्याचप्रमाणे अनेक श्रद्धावानांनी फेसबुक आदि सोशल मिडियाच्या माध्यमातून\nविजयादशमी (दसर्‍याच्या) दिवशी करावयाचे श्रीमहासरस्वती व श्रीसरस्वती पूजन\nविजयादशमी म्हणजेच दसर्‍याच्या दिवशी सद्‌गुरु अनिरुध्द बापूंनी सांगितल्याप्रमाणे श्रध्दावानांनी श्रीमहासरस्वती व श्रीसरस्वतीचे पूजन करणे श्रेयस्कर असते. ते कसे करावे व का करावे ह्याची माहिती स्वत: बापूंनी गेल्या वर्षी प्रवचनामध्ये सांगितल्याप्रमाणे खाली देत आहे. पूजनासाठी एका दगडी पाटीवरच श्रीमहासरस्वती व श्रीसरस्वती च्या खाली दिलेल्या प्रतिमा प्रेमाने काढाव्यात व त्यांचे मन:पूर्वक पूजन करावे. ही दोन्ही चित्रं बाजू-बाजूला काढायची असतात. आपल्या जीवनाचे भाग्य आपण घडवतो. पण त्यासाठी लागणारी उर्जा ह्या प्रतिकांमधून आपल्याला मिळते.\n‘मैं हूँ’ यह त्रिविक्रम का मूल नाम है – भाग २ (‘ I Am ’ Is Trivikram’s Original Name – Part 2) मानव को स्वयं के बारे में कभी भी नकारात्मक रूप में नहीं सोचना चाहिए भगवान से कुछ मांगते समय भी सकात्मक सोच ही होनी चाहिए भगवान से कुछ मांगते समय भी सकात्मक सोच ही होनी चाहिए ‘भगवान आप मेरे पिता हो और मैं आपका पुत्र हूं ‘भगवान आप मेरे पिता हो और मैं आपका पुत्र हूं आप ऐश्वर्यसंपन्न हो, ऐश्वर्यदाता हो इसलिए मेरे पास भी ऐश्वर्य है, आप उसे\nआरती- दुर्गे दुर्घट भारी (प्रत्येक शब्द का अर्थ एवं सरलार्थ सहित) (Aarti Durge Durghat Bhari\nदुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥ वारी वारी जन्ममरणांतें वारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥ वारी वारी जन्ममरणांतें वारी हारी पडलो आता संकट निवारी ॥ 1 ॥ जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी हारी पडलो आता संकट निवारी ॥ 1 ॥ जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ ॥ त्रिभुवनभुवनी पाहता तुजऐसी नाही सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ ॥ त्रिभुवनभुवनी पाहता तुजऐसी नाही चारी श्रमले परंतु न बोलवे कांही ॥ साही विवाद करिता पडिले प्रवाही चारी श्रमले परंतु न बोलवे कांही ॥ साही विवाद करिता पडिले प्रवाही ते तूं भक्तांलागी पावसि लवलाही॥ जय देवी… प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा ते तूं भक्तांलागी पावसि लवलाही॥ जय देवी… प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा \n‘मैं हूँ’ यह त्रिविक्रम का मूल नाम है (‘I Am’ Is Trivikram’s Original Name) आदिमाता चण्डिका और उनके पुत्र त्रिविक्रम (Trivikram) से कुछ मांगते समय श्रद्धावान को सकारात्मक (पॉझिटिव्ह) रूप से मांगना चाहिए वेदों के महावाक्य यही बताते हैं कि हर एक मानव में परमेश्वर का अंश है वेदों के महावाक्य यही बताते हैं कि हर एक मानव में परमेश्वर का अंश है यदि मानव में परमेश्वर का अंश है तो उसे नकारात्मक रूप से मांगने की आवश्यकता ही नहीं है यदि मानव में परमेश्वर का अंश है तो उसे नकारात्मक रूप से मांगने की आवश्यकता ही नहीं है ‘मैं हूँ’ यह त्रिविक्रम\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ- भाग १५ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam – Part 15) लहान मूल ज्याप्रमाणे आपल्या आईवडिलांकडे, आजीआजोबांकडे हट्ट करते, अन्य कुणा तिर्‍हाइकाकडे हट्ट करत नाही; त्याप्रमाणे श्रद्धावानाने आपल्या पित्याकडे म्हणजेच त्रिविक्रमाकडे हट्ट करावा, त्रिविक्रमाच्या मातेकडे म्हणजेच आपल्या आजीकडे अर्थात श्रीमातेकडे हट्ट करावा. त्रिविक्रमच उचित ते सर्वकाही देणारा आहे. या जगात जे जे काही शुभ, कल्याणकारी, मंगल आहे ते निर्माण करणारा ‘जातवेद’ त्रिविक्रम आहे.\nदररोज दहा मिनिटे शान्त बसा- भाग २ (Sit Quite For 10 Minutes Every Day- Part 2) रोज दिवसातून कमीत कमी दहा मिनिटे शान्तपणे बसा (Sit Quite). शान्तपणे बसण्याआधी ‘हरि ॐ, श्रीराम अंबज्ञ’ म्हणा आणि उठण्याआधी ‘जय जगदंब जय दुर्गे’ म्हणा. लक्ष्मी म्हणजे सर्व प्रकारची संपन्नता. अशा या लक्ष्मीमातेला श्रद्धावानाकडे घेऊन येणारा तिचा पुत्र त्रिविक्रम आहे. लक्ष्मीमातेचा श्रद्धावानाच्या जीवनात सर्वत्र संचार करण्याचा मार्ग प्रशस्त करणारा त्रिविक्रम आहे. या शान्तपणे बसण्यामुळे हा\nदररोज दहा मिनिटे शान्त बसा (Sit Quite For 10 Minutes Every Day) दररोज दिवसातून वेळ काढून किंवा रात्री कमीत कमी दहा मिनिटांसाठी तरी शान्त बसा. शरीर स्थिर आणि मन शान्त करा. मनात जरी विचार आले तरी विरोध करू नका. दहा मिनिटे बसण्याआधी ‘हरि ॐ, श्रीराम अंबज्ञ’ म्हणा आणि दहा मिनिटे झाल्यावर ‘जय जगदंब जय दुर्गे’ म्हणा. दररोज दहा मिनिटे शान्तपणे बसण्याबाबत सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १८ जून २०१५ रोजीच्या प्रवचनात जे\n‘ अंबा ’ या शब्दाचा अर्थ (The Meaning Of The Word ‘ Amba ’) दुर्गामातेच्या आरतीत ‘अनाथनाथे अंबे’ हे शब्द येतात. ‘ अंबा ’ या शब्दाचे ‘अंबे’ हे संबोधन आहे. ‘ अंबा ’ या शब्दाचा अर्थ आहे- ‘माझी प्रिय आई’. लहान मूल जसे ‘माझी आई’ या भावनेने आईला बिलगते, त्या माझेपणाच्या, प्रेमाच्या भावाने मोठ्या आईला साद घालायला हवी. अंबा या शब्दाच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १८ जून २०१५ रोजीच्या प्रवचनात\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग १४ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam – Part 14) सर्व प्रकारच्या प्रगतीची देवता लक्ष्मीमाता (Laxmi) आहे. ‘हे जातवेदा, लक्ष्मीमातेला माझ्याकडे घेऊन ये’, अशी प्रार्थना ब्रह्मवादिनी लोपामुद्रा श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत करते. मानवाकडे असणारी सर्वांत मोठी क्षमता आहे- प्रार्थना (prayers) करण्याची क्षमता. प्रार्थना म्हणजे प्रेमाने, विश्वासाने भगवंताला साद घालणे, मनोगत सांगणे. श्रद्धावानाने प्रेमाने, विश्वासाने केलेली प्रार्थना भगवंताने ऐकली नाही असे कधी होऊच\nसर्वदृष्ट्या अचूक होण्यामागे लागणे हे क्षितिजाला धरण्यासाठी धावण्याप्रमाणे आहे (Perfection is like chasing the horizon) – Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 18 June 2015\nसर्वदृष्ट्या अचूक होण्यामागे लागणे हे क्षितिजाला धरण्यासाठी धावण्याप्रमाणे आहे (Perfection is like chasing the horizon) सर्वदृष्ट्या अचूक असणे म्हणजेच पर्फेक्शन (Perfection) ही गोष्ट माणसाच्या शक्यतेबाहेरची आहे. सर्वदृष्ट्या अचूक असणे हे क्षितिज आहे, कल्पना आहे. श्रद्धावान काल होता त्यापेक्षा आज अधिक विकसित व्हावा यासाठी त्रिविक्रम श्रद्धावानाच्या जीवनात, त्रिविध देहात तीन पावले दररोज चालतच असतो. कालच्या पेक्षा आज मी अधिक कसा विकसित (progress) होईन याकडे लक्ष द्या कारण सर्वदृष्ट्या अचूक होण्यामागे लागणे\nत्रिविक्रम ज्ञान देतो (Trivikram Imparts Knowledge) ज्ञान हे नेहमी बुद्धी, मन आणि कृती या तीन पातळ्यांवर प्रवाहित होणे आवश्यक असते. एखादी गोष्ट बुद्धीला पटली, तरी मनाला पटणे आणि कृतीत उतरणे हेसुद्धा महत्त्वाचे आहे. या तीनही पातळ्यांवर एकत्रितपणे ज्ञान प्रवाहित करणारा त्रिविक्रम (Trivikram) आहे. ज्ञानाच्या तीन पातळ्यांवर त्रिविक्रम (Trivikram) ज्ञान कसे देतो याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १८ जून २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि\nतुम्हारी उपलब्धि नहीं बल्कि तुम्हारा विश्वास निर्णायक साबित होता है (You Are Not Judged By Your Performance, You Are Judged By Your Faith) नववर्ष २०१५ में श्रद्धावानों ने प्रेम के पौधे को बढाने का, तुलना न करने का, न्यूनगंड को जगह न देने का, विकास के लिए हर रोज रात को कम से कम १० मिनट शान्ति से बैठने का संकल्प किया है तुम कितने बडे बडे काम करते हो\nत्रिविक्रम तुमसे प्रेम करते हैं (Trivikram Loves You) श्रद्धावान को दुष्प्रारब्ध से डरना नहीं चाहिए, किसी भी मुसीबत से हार नहीं माननी चाहिए आदिमाता चण्डिका और उनके पुत्र त्रिविक्रम से श्रद्धावान को सहायता अवश्य मिलती है आदिमाता चण्डिका और उनके पुत्र त्रिविक्रम से श्रद्धावान को सहायता अवश्य मिलती है वे श्रद्धावान की हर प्रकार से सहायता करते ही हैं वे श्रद्धावान की हर प्रकार से सहायता करते ही हैं त्रिविक्रम क्यों हमारे लिए इतना करते हैं त्रिविक्रम क्यों हमारे लिए इतना करते हैं क्योंकि वे प्रेममय हैं क्योंकि वे प्रेममय हैं त्रिविक्रम तुमसे निरपेक्ष प्रेम करते हैं, इस बारे में परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध\nईरान मसले पर तनाव बढा\nत्रिविक्रमाची १८ वचने (मराठी)\nत्रिविक्रम के १८ वचन (हिन्दी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/cheap-royal+shirts-price-list.html", "date_download": "2018-08-18T08:07:33Z", "digest": "sha1:X4WFAQEZJS2AOJRWY5EJXUFYNQNKSEHX", "length": 18598, "nlines": 552, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये रॉयल शिर्ट्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap रॉयल शिर्ट्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त शिर्ट्स India मध्ये Rs.399 येथे सुरू म्हणून 18 Aug 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. Royal में s फॉर्मल शर्ट Rs. 630 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये रॉयल शर्ट आहे.\nकिंमत श्रेणी रॉयल शिर्ट्स < / strong>\n0 रॉयल शिर्ट्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 300. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.399 येथे आपल्याला सांज Royal में s फॉर्मल शर्ट बाप्व्क्स१०० लीगत Blue क्सल उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 4 उत्पादने\nउ स पोलो अससोसिएशन\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nकूक न कीच डिस्नी\nरस र 500 अँड बेलॉव\nसांज Royal में s फॉर्मल शर्ट बाप्व्क्स१०० लीगत Blue क्सल\nRoyal पार्कर में s फॉर्मल शर्ट\nRoyal में s फॉर्मल शर्ट\nरॉयल ब्लू फॉर्मल शर्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.vsagar.org/marathi-mcu-8/", "date_download": "2018-08-18T08:46:18Z", "digest": "sha1:NSUIH34J35FOZBC6A73DNNBVYBXORJ4O", "length": 10908, "nlines": 70, "source_domain": "www.vsagar.org", "title": "मराठीतून मायक्रोकंट्रोलर शिका – ८ – Vidyasagar Academy", "raw_content": "\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – ८\nThis post is part of the series मराठीतून मायक्रोकंट्रोलर प्रोग्रामिंग शिका\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – १\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – २\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – ३\nसर्वांसाठी अतिशय सोप्या भाषेत मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिकण्यासाठी विद्यासागर सरांनी चालू केलेला हा उपक्रम. आपला अभिप्राय अवश्य कळवा.\nभाग आठवा (शेवटचा भाग)\nया शेवटच्या भागात विद्यासागर अकॅडेमीच्या लॅबमध्ये तयार केलेले आणि संपूर्णपणे टेस्ट केलेले वेगवेगळे प्रोग्राम्स खाली दिले आहेत. यातील कोणताही प्रोग्राम आपल्या डेव्हलपमेंट बोर्डमध्ये बर्न करण्यासाठी, पहिले Keil uVision3 मध्ये हा प्रोग्राम लिहा आणि कम्पाइल करा. त्यानंतर त्याची हेक्स फाईल मायक्रोकंट्रोलरमध्ये बर्न करा.\nविद्यासागर अकॅडेमीत ८०५१ मायक्रोकंट्रोलरची संपूर्ण किट उपलब्ध आहे. या किटमध्ये प्रोग्रामिंग आणि रोबोटिक्सच्या अभ्यासासाठी लागणारे सर्व साहित्य दिले आहे. अधिक माहिती साठी इथे क्लिक करा.\nअभ्यासासाठी तयार केलेले बेसिक प्रोग्राम्स\nएक LED ब्लिंक करण्याचा कोड\nसर्व ८ LEDs विविध पद्धतीने ब्लिंक करण्याचा कोड\nरोबोट मागे आणि पुढे चालविण्याचा कोड\nब्लॅक लाईन वर चालणारा रोबोट\nव्हाईट लाईनवर चालणारा रोबोट\nटेबलावर चालणारा रोबोट (टेबलावरून खाली न पडता हा रोबोट चालत राहतो)\nअडथळे वाचवून चालणारा रोबोट\nअभ्यासासाठी तयार केलेले कठीण प्रोग्राम्स\nLED डिस्प्ले कंट्रोल करणारा कोड\nमोबाईलद्वारे आपल्या घरातील उपकरणे नियंत्रित करा\nरिमोट काँट्रोल्ड रोबोटचा सोपा कोड\nरिमोट काँट्रोल्ड आणि टेबलावर न पडता चालणारा रोबोट\nरिमोट कंट्रोल्ड रोबोटिक आर्म\nहावभावांप्रमाणे कंट्रोल करता येणारा रोबोट\n८०५१ मायक्रो कंट्रोलर सोबत सर्वो मोटर कशी वापरावी\n८०५१ मायक्रो कंट्रोलर मधील टायमर झिरो कसा वापरावा\nतर मित्रांनो, अशा प्रकारे हा कोर्स इथे पूर्ण झाला, म्हणजे माझ्या बाजूने पूर्ण झाला. मात्र तुम्हाला यातून पुढे खूप शिकायचे आहे. वर दिलेला प्रत्येक प्रोग्राम नीट समजून घ्या. त्यातील प्रत्येक लाईनचे काय कार्य आहे, ते समजून घेणे महत्वाचे आहे.\nविद्यासागर अकॅडेमीच्या “८०५१ रोबोटिक्स कोर्स” साठी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. या कोर्समध्ये अतिशय सोप्या पद्धतीने अगदी बेसिक गोष्टींपासून रोबोटिक्सचा अभ्यासक्रम शिकविल्या जातो.\nगेल्या ८-९ वर्षांपासून विद्यासागर अकॅडेमीत बेसिक रोबोटिक्स, ऍडवान्सड रोबोटिक्स, Arduino रोबोटिक्स, Raspberry Pi रोबोटिक्स, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आणि PCB डिझाईनिंग इत्यादी कोर्सेस अत्यंत माफक फी घेऊन, संपूर्ण प्रात्यक्षिकांसहित शिकविले जातात. प्रत्येक कोर्स मध्ये विद्यार्थ्याला (स्वतःचे म्हणून घरी प्रयोग करण्यासाठी) संपूर्ण साहित्य दिले जाते. या साहित्याची वेगळी फी आम्ही घेत नाही.\nआतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी विद्यासागर अकॅडेमीत हे विविध कोर्सेस केले आहेत. येथे शिकलेल्या आमच्या विद्यार्थ्यांचे अनुभव काय आहेत, ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nविद्यार्थ्यांना अत्यंत माफक फीमध्ये जास्तीतजास्त चांगले मार्गदर्शन आणि साहित्य मिळावे हाच विद्यासागर अकॅडेमीचा शुद्ध हेतू आहे.\nतर मित्रांनो, हा ८ भागांमध्ये विभागलेला कोर्स तुम्ही आपल्या घरी बसूनही करू शकता. त्यासाठी तुम्हाला विद्यासागर अकॅडेमीने तयार केलेल्या साहित्याची आवश्यकता आहे. हे साहित्य विकत घेण्यास या लिंकवर क्लिक करा.\nजर तुम्हाला विद्यासागर अकॅडेमीत येऊन हा कोर्स प्रत्यक्षपणे करावयाचा असेल तर त्यासाठी तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. १५-१५ दिवसांचे हे कोर्सेस, विद्यासागर अकॅडेमीत वर्षभर चालू असतात. रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथे क्लिक करा.\nमित्रांनो, “मराठीतून मायक्रोकंट्रोलर प्रोग्रामिंग शिका” या माझ्या प्रयत्नाचे खरोखरीच चीज होत आहे अथवा नाही, हे समजण्यासाठी, आपला अभिप्राय अवश्य लिहा. आपल्याला या कोर्समध्ये काही सुधारणा सुचवावयाच्या असतील, काही चुका निदर्शनास आल्या असतील, तर त्या अवश्य कळवा. माझा हा प्रयत्न केवळ एकतर्फी राहू नये (अरण्यरुदन होऊ नये) आणि आपल्याला या कोर्सचा फायदा व्हावा इतकीच माफक अपेक्षा आहे.\nम्हणून मित्रांनो, आपला अभिप्राय कळविण्यास विसरू नका.\nया कोर्ससंबंधी आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण अथवा काही प्रश्न असल्यास मला ई-मेल करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aniruddhafriend-nandansinh.blogspot.com/2016/02/airliftmoviereviewhindifilm.html", "date_download": "2018-08-18T08:44:39Z", "digest": "sha1:I2KLN4QATF6JVCHBU24VBOOST2E45AIO", "length": 20839, "nlines": 235, "source_domain": "aniruddhafriend-nandansinh.blogspot.com", "title": "एअरलिफ्ट - एक अद्भुत रेस्क्यू ऑपरेशन ....Airlift | अंबज्ञ | नाथसंविध्‌ ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2 '+ cate +'", "raw_content": "\nMy Art (माझी कला)\nएअरलिफ्ट - एक अद्भुत रेस्क्यू ऑपरेशन ....Airlift\nहल्लीच रिलीज झालेल्या ’एअरलिफ्ट Airlift’ या चित्रपटाविषयी वाचले, आणि त्याबद्दलचे रिव्ह्यूजही पाहिले, लगेचच चित्रपटही पाहिला. हा चित्तथरारक चित्रपट पाहताना अगदी प्रत्येक प्रेक्षक रंगून गेला आणि चित्रपटाच्या कथानकाच्या बरोबर प्रवाहात वाहात गेला. एक जबरदस्त विषय, तितकाच जबरदस्त चित्रपट, थ्रिलर आणि रोमांचकारी कथानक, जीवंत वाटणारे कलाकार आणि त्यांचा उत्तम अभिनय या अशा सगळ्या उत्तमोत्तम गोष्टीत प्रेक्षक अलगद गुंफला जातो आणि या चित्रपटाच्या पार मोहात पडून त्याकडे ओढला जातो. चित्रपटाचे नाव वाचून साधारणत: एखाद्या रेस्क्यू ऑपरेशनचे चित्रण असावे असा आपला अंदाज खरा ठरतो, पण हा अंदाज इतक्या थरारकपणे आणि परखडपणे मांडला आहे की त्याची भेदकता प्रेक्षक संपूर्ण चित्रपटापर्यंत अनुभवतो.\n’एअरलिफ्ट’ ही एका ’रणजीत कट्याल’ नामक भारतीयाची कहाणी आहे, ज्याचा कुवैतमधे स्वत:चा जम बसवलेला बिझनेस आहे. १९८० - १९९० च्या दशकामधे इराक आणि कुवैत या दोन्ही सत्तांमधील संघर्षामधे प्रत्येक कुवैती भरडला गेला. इराकमधील सैन्यदलाने अत्यंत क्रूरपणे आणि अमानुषपणे कुवैती नागरिकांवर सत्ता गाजवली आणि त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची दया न दाखवता हल्ला चढवला. कुवैत मधे तेव्हा स्थायिक असलेल्या जवळपास पावणे दोन लाख भारतीयांना ’अचानक’ स्वदेश आठवला आणि त्यांना मायदेशी परतण्याची निकडीची गरज निर्माण झाली. पण इंडियन एंबसीचेसुद्धा इराकी सैनिकांनी हात बांधून ठेवले असल्यामुळे एवढ्या भारतीयांना स्थलांतरीत करणे हे निव्वळ अशक्य होऊन बसले. इकडे आड आणि तिकडे विहिर अशा विचित्र परिस्थितीत अडकलेल्या सार्‍या भारतीयांना आता या रणजीत कटियालचाच आधार वाटू लागला. स्वत:ला अगदी सहज भारतात परत जाणे शक्य असणार्‍या कटियालने तसे न करता संकटात अडकलेल्या प्रत्येक भारतीयाला फिजीकली आणि मेंटली सपोर्ट दिला आणि नकळत त्यांचा तो लिडर बनला. एवढ्या सार्‍या भारतीयांना अशा आणीबाणीच्या परिस्थीतीत सुरक्षित ठेवणे हे जवळपास अशक्यप्राय होते, तरीही त्याने सगळ्यांना सांभाळलं, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता या अडकलेल्या भारतीयांसाठी, त्यांना स्वदेशी परत पाठवण्यासाठी शक्य असेल ती सगळी मदत तो करत होता. मनात धगधगती जिद्द असल्यामुळे स्वत:च्या फसलेल्या प्रयत्नांनीही तो निराश न होता शेवटी त्याने हाती घेतलेले हे रेस्क्यू ऑपरेशन सक्सेसफूल करून दाखवले.\nया चित्रपटातील काही व्यक्तीरेखा आणि प्रसंगही जरूर नमूद करावेसे वाटतात. कटियालच्या ऑफिसात केवळ एक आसरा म्हणून घुसलेला, सदैव तक्रार करणारा आणि असमाधानी असलेला वृद्ध गृहस्थ, त्याचा चित्रविचित्र संवादामुळे नकळतच चित्रपटात घडणारे हलके विनोद, तसेच त्याच्या वर्तनामुळे आलेला राग प्रेक्षकांना चित्रपटाच्या शेवटपर्यंत जाणवतो. कटियालच्या या रेस्क्यु ऑपरेशनमधे खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहिलेली त्याची बायको, तिचा ताकदीचा अभिनय, कटियालला परोपरी मदत करणारा आणि स्वत:ची नुकतीच लग्न झालेली बायको या आणीबाणीच्या प्रसंगात हरवली असतानाही केवळ एका कुवैती नागरीकाम्च्या सुटकेसाठी पासपोर्टवर तिचा पती दर्शवणारा साजीद; सगळ्या भारतीयांच्या सुटकेबरोबरच एका असहाय्य कुवैती स्त्रीच्याही पाठी खंबीरपणे उभा राहणारा आणि तिला कुवैतमधून सहीसलामत बाहेर काढणारा कटियाल; एकीचे बळ मिळते फळ या म्हणीप्रमाणे शेवटच्या चेकपोस्टला इराकी सैन्याला शस्त्ररहीत भारतीयांच्या सहाय्याने चारलेली धूळ; तसेच चित्रपटातील काही संवाद मनाला अतिशय भावतात आणि कायम लक्षात राहतात.\n’एअरलिफ्ट’ हा वॉर थ्रिलर सिनेमा खरोखरीच सुपर्ब आहे. सर्वांनी अवश्य बघावा असा आहे. हा चित्रपट चालू असताना काही प्रसंगांना टाळ्या वाजवायला आपसूकच हात पुढे सरसावले. हा चित्रपट संपल्यावर काही प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडाही ओलावलेल्या जाणवल्या - नक्कीच देशप्रेमामुळे. प्रेक्षक बाहेर जाण्यासाठी उभे तर राहिले, पण पार शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचे पाय थिएटरबाहेर निघेना. हे या चित्रपटाचे यश आहे असे वाटते. तर हा असा सुंदर चित्रपट पाहण्याची सुवर्णसंधी कोणत्याही प्रेक्षकाने दवडू नये असे मनापासून वाटते.\nएअरलिफ्ट - एक अद्भुत रेस्क्यू ऑपरेशन ....Airlift\n’सालाबादप्रमाणे’ ही कविता तंतोतंत पटली\nसद्गुरु श्री अनिरुद्ध बापू\nयूरोप में शरणार्थियों का संकट और गहरा हुआ\nएकंदरीत काय तर युद्ध, युद्ध आणि युद्धच\nShridhar's Ham: हॅम रेडिओ म्हणजे नक्की काय\nप्रत्यक्षचा नववर्षविशेषांक - \"मी पाहिलेला बापू\"\nAniruddha Bapu - हाचि नववा नववा आगळा\nAniruddha Bapu's Grace - Shrutiveera Powle's Experience - भूत बाधा - बरीच वर्षे भूतबाधेचा त्रास. मातृवात्सल्यविन्दानम्‌ ग्रंथ घरात आ...\nआज ३१ डिसेंबर, वर्षाचा शेवटचा दिवस.... ३१ डिसेंअर म्हंटले की सर्वांना आठवतो तो उत्साह, जल्लोश. आदल्या रात्री ऑफिसमधून बसने घरी जात असताना ...\nShree Shabda Dhyanyog Pustika (श्रीशब्दध्यानयोग पुस्तिका)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/llb-admission-till-31-july-132654", "date_download": "2018-08-18T09:02:06Z", "digest": "sha1:EJ2SFJKPOMZYBAA535GVVPWJETALKS5O", "length": 12692, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "LLB admission till 31 July \"एलएलबी' प्रवेशाच्या अर्जाची 31 पर्यंत मुदत | eSakal", "raw_content": "\n\"एलएलबी' प्रवेशाच्या अर्जाची 31 पर्यंत मुदत\nसोमवार, 23 जुलै 2018\nनाशिक - कुठल्याही शाखेतून पदवी शिक्षण घेणाऱ्या पदवीधर विद्यार्थ्यांकरीता तीन वर्षे कालावधीच्या एलएलबी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्जासाठी 31 जुलैपर्यंत मुदत आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट असून, त्यासाठी 19 सप्टेबरपर्यंत मुदत दिली आहे.\nनाशिक - कुठल्याही शाखेतून पदवी शिक्षण घेणाऱ्या पदवीधर विद्यार्थ्यांकरीता तीन वर्षे कालावधीच्या एलएलबी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्जासाठी 31 जुलैपर्यंत मुदत आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट असून, त्यासाठी 19 सप्टेबरपर्यंत मुदत दिली आहे.\nराज्यातील अकरा विद्यापीठांमधधील 13 हजार 840 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. विविध पदवी शिक्षणक्रमाच्या प्रवेशाची मुदत अंतिम टप्यात असताना, विधी शाखेच्या या अभ्यासक्रमाची प्रक्रिया उशिराने सुरू झाली आहे. त्यातच जात वैधता प्रमाणपत्राची अट घातल्याने प्रवेशावर त्याचा थेट परिणाम होणार आहे.\nसद्यःस्थितीत जाहिर केलेल्या वेळापत्रकानुसार, 8 ऑगस्टला प्रारूप गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. तर त्यावर हरकती नोंदविण्यासाठी 9 ते 13 ऑगस्टदरम्यान मुदत असेल. अंतिम गुणवत्ता यादी 23 ऑगस्टला जाहीर होणार आहे. यानंतर पहिली निवड यादी 30 ऑगस्टला जाहीर होईल. यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 31 ऑगस्ट ते 5 सप्टेबरपर्यंत मुदत असेल. त्यानंतर दुसरी गुणवत्ता यादी 14 सप्टेंबरला जाहीर होणार आहे. या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 15 ते 19 सप्टेबरपर्यंत मुदत असेल. दोन फेऱ्यांनंतर सीईटीत पात्र ठरलेले व ऑनलाइन अर्ज केलेले विद्यार्थी रिक्‍त जागांचा अंदाज घेत महाविद्यालयात प्रवेशासाठी नव्याने प्राधान्यक्रम दाखल करू शकतील. त्यासाठी 22 ते 27 सप्टेंबरपर्यंत मुदत असेल. यानंतर तिसरी निवड यादी 10 ऑक्‍टोबरला जाहीर होईल. यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 11 ते 16 ऑक्‍टोबरदरम्यान प्रवेशाची मुदत असेल.\nघरकामगार, बांधकाम मजूर महिलांची उपेक्षाच\nजळगाव : दिवसरात्र काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, पण डोक्‍यावर हक्काचं छत नाही...सतत कष्ट करूनही पदरी काहीच न पडल्यामुळे अनेकदा उपवास...\nडिजिटायझेशन'ने दुर्मिळ ग्रंथही चिरकाल \nजळगाव ः पुस्तकांचा खजिना सांभाळणाऱ्या अनेक वाचनालयांना शतकोत्तरी परंपरा लाभलेली आहे. परंतु काळानुरूप ग्रंथालयांनी तंत्रज्ञानाशी जुळवून, त्या दिशेने...\nविद्यार्थ्यांची जबाबदारी शिक्षकांबरोबर पालकांचीही - प्राध्यापक पंकज गावडे\nनवी सांगवी (पुणे) - \" चारित्र्यवान साने गुरूजींचे जीवन हे त्यांच्या शिक्षकांबरोबर त्यांची वात्सल्यसिंधु आईच्या संस्कारामुळे घडले, त्यामुळे...\nसमस्या सोडवण्यासाठी नाशिकला भरणार शिक्षकांचा दरबार\nयेवला - शिक्षकांच्या विविध रखडलेल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी नाशिकमध्ये विभागातील शिक्षकांचा शिक्षक दरबार गुरुवारी (ता.२३) आयोजित करण्यात आला...\nथ्री डी कोलाजमधून साकारले शिवचरित्र\nइचलकरंजी - जिद्द आणि चिकाटी ठेवत तब्बल ७ वर्षे परिश्रम घेत, येथील डॉ. ज्योती दशावतार बडे यांनी थ्री डी कोलाजमधून अवघे शिवचरित्र साकारले आहे. हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/demanded-action-block-development-officer-127322", "date_download": "2018-08-18T09:02:18Z", "digest": "sha1:DXIPFJEW2WWIYO2YFGAGQUOF7EZQGB6U", "length": 13360, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "demanded to action on the block Development Officer अकार्यक्षम गटविकास अधिकाऱ्यांवर पदाधिकाऱ्यांकडून कारवाईची मागणी | eSakal", "raw_content": "\nअकार्यक्षम गटविकास अधिकाऱ्यांवर पदाधिकाऱ्यांकडून कारवाईची मागणी\nशनिवार, 30 जून 2018\nगटविकास अधिकारी अनिल वाघमारे हे कामावर रुजू झाल्यापासून एक दिवसही मुख्यालयात हजर राहून त्यांनी कर्तव्य बजावलेले नाही. त्यामुळे तालुक्याच्या विकासावर विपरीत परिणाम झाला असून त्यांची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सभापती बेबी लेकामी, उपसभापती नितेश नरोटी, सदस्य जनार्धन नल्लावार व पदाधिकाऱ्यांनी मुख्यकार्यपालन अधिकारी यांना निवेदनातून केली आहे.\nएटापल्ली (गडचिरोली) - येथील गटविकास अधिकारी अनिल वाघमारे हे कामावर रुजू झाल्यापासून एक दिवसही मुख्यालयात हजर राहून त्यांनी कर्तव्य बजावलेले नाही. त्यामुळे तालुक्याच्या विकासावर विपरीत परिणाम झाला असून त्यांची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सभापती बेबी लेकामी, उपसभापती नितेश नरोटी, सदस्य जनार्धन नल्लावार व पदाधिकाऱ्यांनी मुख्यकार्यपालन अधिकारी यांना निवेदनातून केली आहे.\nवाघमारे हे गेल्या एका वर्षापासून पंचायत समीती एटापल्ली येथे कार्यरत आहेत ते रुजू झाल्यापासून मुख्यालयात उपस्थित न राहता 35 की. मी. अंतरावरील अहेरी या शहरातून ये-जा करतात त्यामुळे इतरही विस्तार अधिकारी व कर्मचारी हे बाहेरील शाहरातून ये-जा करून कर्तव्य बजावत आहेत परिणामी विकास कामे व योजनांवर विपरीत परिणाम होऊन, घरकुल, शौचालय, सिंचन विहिरी व इतर शेतकरी, शेतमजूर व विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शासकीय लाभच्या योजनांपासून वंचित रहावे लागत आहे.\nपंचायत समिति मालकीच्या मुख्य बाजारपेठेतील दोन ते तीन एक्कर भूखंडावर भूमाफियांनी बेधड़क अतिक्रमण करून भूखंड हड़प करण्याचा प्रकार होतांना गटविकास अधिकारी वाघमारे हे नागरिकांच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात असेही आरोप सभापती व इतर पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केले आहेत.\nअशा अकार्यक्षम गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांच्या संपूर्ण कार्यकाळाची सखोल चौकशी करून कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.\nतक्रारीतील संपुर्ण आरोप खोटे व बिनबुडाचे आहेत मी माझे कर्तव्य प्रामाणिक बजावत असून कोणतीही चौकशीला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे, असे गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे.\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nपिंपळवंडीला मानव-बिबट सहजीवन जनजागृती\nजुन्नर - पिंपळवंडी ता.जुन्नर येथे मानव व बिबट संघर्ष व सहजीवन याविषयी मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती करण्यात आली. जुन्नर वन विभाग तसेच...\nरावेतला स्वतंत्र पोलिस चौकीची मागणी\nवाल्हेकरवाडी - रावेत परिसराचा विकास झपाट्याने वाढत आहे, त्याचप्रमाणे गुन्हेगारीही वाढत आहे. रावेत परिसरात गुन्हा घडला अथवा काही कारणास्तव पोलिस...\nताडगाव - मोफत आरोग्य शिबिरात गरिब व आदिवासी नागरीकांनी घेतला लाभ\nपाली - सुधागड तालुक्यातील ताडगाव येथे गुड डुअर्स चैरिटीज मुंबई, टिकेडिके परिसर विकास संघर्ष समिती आणि जय भैरवनाथ युवा मित्र मंडळ ताडगांव यांच्या...\nसैनिकांमुळे आपण सुरक्षित : आमदार औटी\nटाकळी ढोकेश्वर : दिवसरात्र देशाच्या सेवेसाठी व आपल्या संरक्षणासाठी सिमेवर सैनिक दिवसरात्र उभा असतो म्हणुन आपण सुरक्षित वावरत आहोत त्यांचे उपकार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/369/Prathama-Tuj-Pahata.php", "date_download": "2018-08-18T08:38:21Z", "digest": "sha1:NADVRBUI7NLZFV6I5TDSMGW3XKJII3UO", "length": 10345, "nlines": 147, "source_domain": "www.gadima.com", "title": "Prathama Tuj Pahata -: प्रथम तुज पाहता : ChitrapatGeete-VeryPopular (Ga.Di.Madgulkar|Ramdas Kamat|Sudhir Phadke) | Marathi Song", "raw_content": "\nकधिं न चळावे चंचल हें मन\nजोंवरि भूवर रामकथानक तोंवर जन्म असावा\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nचित्रपट: मुंबईचा जावई Film: Mumbaicha Jawai\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nप्रथम तुज पाहता जीव वेडावला\nउचलुनी घेतले नीज रथी मी तुला\nस्पर्ष होता तुझा विसरलो भान मी\nधुंद श्वासातला प्राशिला गंध मी\nनयन का देहही मिटुनी तू घेतला\nजाग धुंदीतुनी मजसी ये जेधवा\nकवळुनी तुजसी मी चुंबिले तेधवा\nधावता रथ पथी पळभरी थांबला\nवास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.\nप्रेमात तुझ्या मी पडले\nप्रिया तुज काय दिसे स्वप्‍नात\nराजहंस सांगतो कीर्तिच्या तुझ्या कथा\nरम्य ही स्वर्गाहून लंका\nरंगू बाजारला जाते हो जाऊ द्या\nसख्यांनो करु देत शृंगार\nसांग तू माझा होशिल का\nसप्रेम नमस्कार विनंती विशेष\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2018-08-18T09:06:20Z", "digest": "sha1:S3WTXZDTX3QCTET6DPIX4FA6ZC6ZG5UM", "length": 6276, "nlines": 68, "source_domain": "m4marathi.com", "title": "गुणकारी हिरवे वाटाणे.... | m4marathi", "raw_content": "\nहिवाळ्यात बाजारात हिरव्या वाटण्याच्या शेंगा हमखास पाहायला मिळतात. खाण्याच्या विविध पदार्थात रंगत आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाटण्यांमध्ये अनेक पोषकद्रव्ये आढळतात. तसेच आरोग्यदृष्ट्या वेगवेगळ्या समस्यांपासून दूर राहण्यासही हिरव्या वाटण्याचा आहारात नियमित समावेश केल्याने चांगला उपयोग होतो. वाताण्यातील आरोग्यदायी गुण खालीलप्रमाणे,\n१) व्हिटामीन ‘के’:- हिरव्या वाटण्यांमध्ये व्हिटामीन ‘के’ भरपूर प्रमाणात असते. यामुळे हाडे मजबूत होतात. हे व्हिटामीन ऑस्टियोपोरोसिस च्या विरोधात चांगले काम करते. एकूणच हिरवे वाटाणे एक पॉवर बुस्टरसारखे काम करते आणि चांगले आरोग्य राखण्याच्या दृष्टीने उपयोगी खाद्य आहे.\n२) कोलेस्टेरॉल दूर ठेवते:- हिरव्या वाटण्यात शरीरातील कोलेस्टेरॉल वाढू न देणारे आरोग्यदायी घटक असतात. हिरव्या वाटाण्यात शरीरात ट्रायग्लिसरीन कमी करणारे गुण असतात. आणि याच्या नियमित सेवनाने कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित राहते. शरीरातील अनेक व्याधीही वाटाण्याच्या नियमित सेवनाने दूर होतात.\n३) हृदयाची काळजी घेते:- हिरव्या वाटाण्यांच्या नियमित सेवनाने हृदयविषयक समस्याही दूर होतात. यातील एन्टी इंफ्लेमेट्री कंपाउंड आणि भरपूर प्रमाणात असलेले एन्टी ऑक्सिडेंट कंपाउंड ह्या दोघांच्या कोंबीनेशनमुळे हृदयविषयक आजारांचा धोका कमी होतो.\n४) वजन कमी करणारे गुण:- हिरव्या वाटाण्यात उच्च फायबर भरपूर प्रमाणात असते ज्याच्या सेवनाने शरीराला उर्जा मिळते मात्र चरबी वाढत नाही.\n५) विसरण्याच्या समस्येपासून सुटकारा देते:- बऱ्याच लोकांना अल्जाइमर हा रोजच्या गोष्टीही विसाराविणारा आजार असतो. हिरव्या वाटाण्याच्या नियमित सेवनाने हा आजार बरा होतो. तसेच ऑस्ट्रीयोपोरोसीस आणि ब्रोंकाइटीस अशा समस्यांशी लाधाण्यासही मदत होते.\n६) ब्लडशुगर संतुलित ठेवते:- हिरव्या वाटाण्यातील उच्च फायबर आणि प्रोटीन शरीरातील ब्लड शुगर चे प्रमाण नियंत्रित ठेवते.\nपाण्याचे फायदे -तोटे ……\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://swarnim-sakhi.blogspot.com/2013/03/blog-post_21.html", "date_download": "2018-08-18T08:17:40Z", "digest": "sha1:QSSVMMZ3UFOIV3LRNMPIMYPMRHZ4QFMB", "length": 9002, "nlines": 140, "source_domain": "swarnim-sakhi.blogspot.com", "title": "Swarnim Sakhi...: फुलाचे मनोगत", "raw_content": "\nपावसात भिजलेले तन मन माझे\nउगीचच रुसण्याचे बहाणे हे तुझे\nक्षणार्धात विरतील दुराव्याचे ढग\nएकदाच परतुनी माझ्याकडे बघ ...\nवारा कसा वेडापिसा फिरे भवताली\nनकळत आज अशी सांज ओली झाली\nएकाकी का वाटे तिथे पावसाळी नभ\nएकदाच परतुनी माझ्याकडे बघ ...\nअंगांवर दाटे अशी थेंब थेंब नक्षी\nओली पिसे झटकुनी गाती किती पक्षी\nनाव तुझे घेउनिया पुकारते जग\nएकदाच परतुनी माझ्याकडे बघ ...\nसुगंध या उरातील सांगते स्मरून\nगळतील पाकळ्या या एकेक करून\nमातीपाशी जीवनाचे निर्माल्य सुभग\nतेव्हातरी एकदाच माझ्याकडे बघ ...\nLabels: flower, कविता, क्षणिका, फुल, मनोगत, सखी, सवाल\nवरचा पहिला गुलाबाचा फोटो मस्त प्रोसेस केला आहे\nमस्त झाली आहे कविता...:)\n अन इथे सख्य असेल ते जे जे उत्तम उदात्त सुंदर अश्या सारया हृद्य गोष्टींचे .. कविता... लेख... पुस्तक.. फोटो .. रंग ... रेषा... उकार ..वेलांट्या.. जगण्यातल्या चिमुकल्या क्षणांचे .. मनस्वी नात्यांच्या इंद्रधनुषी गोफांचे.. लडीवाळपणे भवती भवती फेर धरणारया आठवणींचे ... अन अंतरी कस्तुरी सारख्या दरवळणारया मैत्रीचे ... किंवा अगदी पायी टोचणारया काट्याचे .. नि पदर ओढत ओरखडे देणाऱ्या निवडुंगाचे सुद्धा .. या सारया गोष्टींचे सख्य आहे.. म्हणून सखी आहे ...\nकुणा एकीने जमवलेली श्रद्धांजली ..\nरोज की तरह आ गयी वो... रोज की तरह बच्चा देखता रहा अपनी भूरी आँखे भरके... हाथ उठाये ... दिल भरमाये ... रोज की तरह ... फिर एक बार आस लगा...\nपावसात भिजलेले तन मन माझे उगीचच रुसण्याचे बहाणे हे तुझे क्षणार्धात विरतील दुराव्याचे ढग एकदाच परतुनी माझ्याकडे बघ ... ...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ७\nदिवस सातवा हाही दिवस असाच पहाटे उठतो... आधी गणपतीची रूप डोळ्यात रेखून... मग बाकी काम चालू करतो.. सकाळीच पूजा, आरती करून शेजारया...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग 5\nदिवस पाचवा.. हा दिवस गाजवत येतो तयारी हरतालिकेची अन गणपतीची .. सुरु होतो तोच वाजत गाजत .. पुन्हा एकदा वारी बाजाराची... तयारी हरतालिकेच...\nA Walk In Cloud.... गत वर्षीची कोजागिरी अशी जगजीत सिंगजींच्या गझलेत चिंब भिजलेली होती... \"हाथ छुटे भी तो रिश्ते नाही तोडा करते\" ...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ३\nदिवस तिसरा हा दिवस शुभ्र सकाळचा... किलबिल पक्ष्यांच्या आवाजाने जागा होणारा... शेजारच्या गोठ्यातल्या गाईच्या घुंगुरवाळा आवाजाचा... ...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ४\nदिवस चौथा हा दिवस तसा आरामाचा... सुशेगात उठण्याचा... कामाची घाई विसरून चहा पार्टी करण्याचा.. तळ्याच्या काठावर बसून शांत...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ६\nदिवस सहावा... अन मग हा उत्सवी दिवस उजाडतो भल्या पहाटेच... मूर्ती स्थानापन्न होते सजवलेल्या माटीच्या मखरात...मागे रंगवलेले चित्र आत...\nपदर ... नक्षीदार पदर ... रेशमी साडीचा...बुट्टीदार काठाचा .. जरतारीच्या मोराचा वयात येताना आपसूकच चापून-चोपून खांद्यावर विसावलेला... सौभ...\nहृद्य वाचकगण - Followers\nकविता (27) तुमचे सुद्धा होते का असेच (14) सखी (10) मैं (9) भक्ती (3) गोकुळ (2) होकार (2) निळा शाम (1) निळाई (1) भूल (1)\nशेअर विथ केअर :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://m4marathi.com/v2/chavlichi-usal/", "date_download": "2018-08-18T09:08:47Z", "digest": "sha1:D7X6FZ2PX3KYITGL2TR5TC6DWJVEVMKH", "length": 3879, "nlines": 75, "source_domain": "m4marathi.com", "title": "चवळीची उसळ | Chavlichi Usal Recipe in Marathi | m4marathi", "raw_content": "\n१) मोड आलेली चवळी दोन वाटया\n२) काळा मसाला दोन चमचे\n३) कांदा एक , भरपूर कोथिंबीर\n४) लसूण तीन पाकळ्या\n५) आवडत असल्यास आंबट गोड चवीसाठी तीन-सर आमसूलं व गुळाचा खडा\n६) कढीपत्त्याची पानं दोन-तीन\n७) तेल चार मोठे चमचे\n९) चवीनुसार मीठ .\n१) चवळी आधी दीड वाटी पाण्यात कुकरमध्ये शिजवून घ्यावी . ही शिजवत असताना आधीच त्यात लसणाच्या पाकळ्या ठेचून , तसंच आमसूल व गूळ टाकावा .\n२) उसळ शिजवून झाल्यावर पातेल्यात फोडणी करावी व त्यात रस हवा असल्यास पाणी घालावं . पाणी उकळल्यावर शिजवलेली उसळ घालावी .\n३) भरपूर कोथिंबीर व कढीपत्त्याची पानं घालावी . आवडत असल्यास तिखट घालावं . (चवळी कुकरमध्ये फार वेळ ठेवू नये नाहीतर उसळीचा लगदा होईल . दहा मिनिटं शिजवावं . तसंच शिजवण्याच्या आधी त्यावर एक चमचा तेल घालावं म्हणजे दाणा दाणा सुटा राहतो .)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://puputupu.in/tag/every-delhi-girl-in-the-world/", "date_download": "2018-08-18T08:04:59Z", "digest": "sha1:XF42YBO5BRFBAIIRS6BOO3AH6JZU2UUC", "length": 4217, "nlines": 108, "source_domain": "puputupu.in", "title": "Every Delhi Girl In The World Archives - PupuTupu.in | PupuTupu.in", "raw_content": "\nतरुणींच्या प्रायव्हेट चर्चा ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसेल\nतरुणींची मानसिकता आता लपलेली नाही, ती आता सामान्य झाली आहे. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात दिल्लीतील मुलीने केलेल्या वक्तव्याला रेकॉर्ड करण्यात आले आहे.\nदिल्लीमध्ये बनविलेल्या या व्हिडिओमध्ये शहरातील मुली कशा उघडपणे बोलतात. त्यांना कोणत्या प्रकारचे मुलं आवडतात. त्यांना काय आवडत नाही. त्या शिवाय तरूणी दररोज कोणत्या गोष्टींवर गप्पा मारतात, ते यात दाखविण्यात आले आहे.\nव्हिडिओ सोशल वेबसाइट यूट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. लाखो लोकांननी याला पाहिले आणि शेअरही केले आहे.\nबिइंग इंडियन नावाच्या यू ट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड केला आहे आणि तो व्हायरल होत आहे. त्यामुळे प्रत्येक जण जाणू इच्छितो की दिल्लीत वाढलेल्या तरूणींची मानसिकता काय आहे.\nएव्हरी इंडियन गर्ल नावाने हा व्हिडिओ चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे. पाहता पाहता हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याला १७ लाख हिट्स मिळाल्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://swarnim-sakhi.blogspot.com/2012/06/let-it-rain.html", "date_download": "2018-08-18T08:17:38Z", "digest": "sha1:EAGELMFTB2V7EK5SCTOCF22ZIJH3IVPO", "length": 7491, "nlines": 113, "source_domain": "swarnim-sakhi.blogspot.com", "title": "Swarnim Sakhi...: Let it Rain....!!!", "raw_content": "\nइंग्रजीत टेस्ट डेवेलप होयचीये बहुतेक अजून ... आपकी प्रार्थना सफल हो|\n अन इथे सख्य असेल ते जे जे उत्तम उदात्त सुंदर अश्या सारया हृद्य गोष्टींचे .. कविता... लेख... पुस्तक.. फोटो .. रंग ... रेषा... उकार ..वेलांट्या.. जगण्यातल्या चिमुकल्या क्षणांचे .. मनस्वी नात्यांच्या इंद्रधनुषी गोफांचे.. लडीवाळपणे भवती भवती फेर धरणारया आठवणींचे ... अन अंतरी कस्तुरी सारख्या दरवळणारया मैत्रीचे ... किंवा अगदी पायी टोचणारया काट्याचे .. नि पदर ओढत ओरखडे देणाऱ्या निवडुंगाचे सुद्धा .. या सारया गोष्टींचे सख्य आहे.. म्हणून सखी आहे ...\nरोज की तरह आ गयी वो... रोज की तरह बच्चा देखता रहा अपनी भूरी आँखे भरके... हाथ उठाये ... दिल भरमाये ... रोज की तरह ... फिर एक बार आस लगा...\nपावसात भिजलेले तन मन माझे उगीचच रुसण्याचे बहाणे हे तुझे क्षणार्धात विरतील दुराव्याचे ढग एकदाच परतुनी माझ्याकडे बघ ... ...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ७\nदिवस सातवा हाही दिवस असाच पहाटे उठतो... आधी गणपतीची रूप डोळ्यात रेखून... मग बाकी काम चालू करतो.. सकाळीच पूजा, आरती करून शेजारया...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग 5\nदिवस पाचवा.. हा दिवस गाजवत येतो तयारी हरतालिकेची अन गणपतीची .. सुरु होतो तोच वाजत गाजत .. पुन्हा एकदा वारी बाजाराची... तयारी हरतालिकेच...\nA Walk In Cloud.... गत वर्षीची कोजागिरी अशी जगजीत सिंगजींच्या गझलेत चिंब भिजलेली होती... \"हाथ छुटे भी तो रिश्ते नाही तोडा करते\" ...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ३\nदिवस तिसरा हा दिवस शुभ्र सकाळचा... किलबिल पक्ष्यांच्या आवाजाने जागा होणारा... शेजारच्या गोठ्यातल्या गाईच्या घुंगुरवाळा आवाजाचा... ...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ४\nदिवस चौथा हा दिवस तसा आरामाचा... सुशेगात उठण्याचा... कामाची घाई विसरून चहा पार्टी करण्याचा.. तळ्याच्या काठावर बसून शांत...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ६\nदिवस सहावा... अन मग हा उत्सवी दिवस उजाडतो भल्या पहाटेच... मूर्ती स्थानापन्न होते सजवलेल्या माटीच्या मखरात...मागे रंगवलेले चित्र आत...\nपदर ... नक्षीदार पदर ... रेशमी साडीचा...बुट्टीदार काठाचा .. जरतारीच्या मोराचा वयात येताना आपसूकच चापून-चोपून खांद्यावर विसावलेला... सौभ...\nहृद्य वाचकगण - Followers\nकविता (27) तुमचे सुद्धा होते का असेच (14) सखी (10) मैं (9) भक्ती (3) गोकुळ (2) होकार (2) निळा शाम (1) निळाई (1) भूल (1)\nशेअर विथ केअर :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/toilets-have-been-stolen-chhattisgarh-44573", "date_download": "2018-08-18T08:24:09Z", "digest": "sha1:R6FF33JNDVVWO4EZLLUVOWKQ35QQSEBQ", "length": 12071, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "toilets have been stolen in Chhattisgarh छत्तीसगडमध्ये शौचालये चोरीस गेल्याची तक्रार | eSakal", "raw_content": "\nछत्तीसगडमध्ये शौचालये चोरीस गेल्याची तक्रार\nगुरुवार, 11 मे 2017\nकागदोपत्री अस्तित्व; अनुदान लाटल्याचा संशय\nविलासपूर: एका महिलेने आपल्या घरातील शौचालये चोरीला गेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करत त्याचा तातडीने शोध घेण्याची मागणी केली आहे.\nस्वच्छ भारत अभियानाअंतर्गत उपलब्ध करून दिलेली दोन शौचालये फक्त कागदोपत्रीच अस्तित्वात असल्याची तसेच, त्याचा निधीही प्रदान केल्याची बाब अमरपूर गावातील रहिवाशी बेला पटेल (वय 70) व त्यांची मुलगी चंदा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली. यामागे ज्या कोणाचा हात आहे, त्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही दोघींनी केली आहे.\nकागदोपत्री अस्तित्व; अनुदान लाटल्याचा संशय\nविलासपूर: एका महिलेने आपल्या घरातील शौचालये चोरीला गेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करत त्याचा तातडीने शोध घेण्याची मागणी केली आहे.\nस्वच्छ भारत अभियानाअंतर्गत उपलब्ध करून दिलेली दोन शौचालये फक्त कागदोपत्रीच अस्तित्वात असल्याची तसेच, त्याचा निधीही प्रदान केल्याची बाब अमरपूर गावातील रहिवाशी बेला पटेल (वय 70) व त्यांची मुलगी चंदा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली. यामागे ज्या कोणाचा हात आहे, त्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही दोघींनी केली आहे.\nया दोन्ही महिला विधवा असून, त्या स्वतंत्रपणे एकाच गावात राहतात. त्यांनी 2015 मध्ये संबंधित योजनेअंतर्गत शौचालयांची मागणी केली होती. त्यानुसार, त्यांना अनुदान मंजूर झाले होते. मात्र, एक वर्ष लोटले तरी कोणतीच कार्यवाही न झाल्याने चौकशी केली असता हा प्रकार उजेडात आला. आरटीआय कार्यकर्ता सुरेंद्र पटेल यांनी माहिती अधिकाराअंतर्गत केलेल्या अर्जाद्वारे यास दुजोरा मिळाला आहे.\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nउंड्री - पाचव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजूर ठार\nउंड्री - गुलाम अली नगर गल्ली नं 6 दि.13 ऑगस्ट दु.12.30 वाजता एका निर्माणाधीन इमारतीचे काम सुरू असताना पाचव्या मजल्यावर पडून राजशेखर माशाले (वय 33...\nरावेतला स्वतंत्र पोलिस चौकीची मागणी\nवाल्हेकरवाडी - रावेत परिसराचा विकास झपाट्याने वाढत आहे, त्याचप्रमाणे गुन्हेगारीही वाढत आहे. रावेत परिसरात गुन्हा घडला अथवा काही कारणास्तव पोलिस...\n13 वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू\nवारजे (पुणे) : महापालिकेच्या पथदिव्याच्या विजेच्या खांबाला धक्का लागून वारजे परिसरातील तेरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.rikoooo.com/mr/board?view=topic&id=74&catid=5", "date_download": "2018-08-18T08:29:50Z", "digest": "sha1:2FMKUAJL4QZF5ADDJD6BX3J5PD5VUMSK", "length": 20732, "nlines": 226, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "निर्देशांक - Rikoooo", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nFSX - FSX स्टीम संस्करण\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 14\n1 वर्ष 6 महिने पूर्वी #203 by PAYSON\nइतर कोणालाही नियमितपणे वेडा catz / saitek भेट पॅनल चालक आणि प्लगइन पुन्हा डाउनलोड करण्यासाठी आहे का मी गोष्ट \"म्हणू होय सर्व\" गोष्टी गुळगुळीत भेट तेथे खालील काम एक बाब आहे तरी शोधू. मी कदाचित फक्त SPAD मिळणे आवश्यक आहे पण मी ते स्वत: च्या थोडे quirks आहे ऐका.\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 21\nमी होते कधीच केले, प्रामाणिकपणे.\nमी Saitek x45 पण मी वर पर्दाफाश माझे गेल्या एक आहे वापरले>.> EBay वर एक x55 बोली लावली होते पण majorly च्यापेक्षा अधिक किंमत बोलणे झाले\nमालक / मुख्य कार्यकारी अधिकारी\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 0\nआपल्या x45 कसे मोडू शकला फक्त जिज्ञासू, माझे भांडी बाहेर गेला. हे माझ्या आवडत्या हेलिकॉप्टर काठी मी झरे बाहेर घेतला. मी ते विकत परंतु प्रयत्न करण्यात अद्याप तो एक जादू स्प्रे त्यांना पुनर्संचयित करणे शक्य ऐकले. मी आंतरराष्ट्रीय शिपिंग वाट पाहत असताना, मी तसेच eBay trolling सुरुवात केली. आपण शोधू शकता सर्वोत्तम ख्रिस काठी (fighterstick USB) $ 40USD जसे, आणि $ 60USD प्रो pedals usb सापडले. मी आवश्यक सर्व गळा आहे आणि मी आनंदी व्हाल.\nमी eBay वर x55 आणि x56 नशीब झाला नाही. खरच एकतर मार्ग, किंवा एक अंधुक सूची (फक्त काठी आणि सर्व circuitry किंवा उलट आहे थ्रॉटल नाही) किंवा विनाचाचणी (एक यूएसबी पोर्ट आणि 30 सेकंद नाही\nबरेच लोक त्यांचा तिरस्कार प्रेम, पण मी पाहिले आहे सर्वोत्तम सौदे एक thrustmaster HOTAS एक्स ($ 20USD) आहे, पण HOTAS 4 ($ 30USD) आहे निळा एक वाट पाहू. मी एक दोन जलद mods (एक paracord हँडल साठी दोन राहील धान्य पेरण्याचे यंत्र, आणि हेलिकॉप्टर साठी कॅलिब्रेशन नंतर स्प्रिंग काढता करण्यासाठी वसंत ऋतु समायोजन दरवाजा सुमारे बाहेरील कडा कापून) आणि हेलिकॉप्टर जाणून घेऊ इच्छित माझे मित्र त्यांना सोडून परत द्या. आपण सहजपणे उद्गार गोष्ट वाहून शकता एकदा एक आश्चर्यकारक लॅपटॉप काठी करते.\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 14\n1 वर्ष 5 महिने पूर्वी #215 by PAYSON\nहाय कुमार, मी एक्स-45 होते कधीच, मी संदेश क्रॉसओवर केलं वाटत. मी कधीही मालकीच्या केलेले सर्व Saitek चे क्ष 55 HOTAS नियंत्रण प्रणाली आहे. ते काहीसे \"जोडले\" असणे आवश्यक आहे. मी फक्त एक काठी आणि मी माझ्या Logitech सर्वोच्च आहे, जे आपण एक विमानाचा मार्गदर्शन तर गरज आहे परत जा इच्छित काही बटणे होते तर. आपण (मी) काही गंभीर AI विरुद्ध कोणत्याही लढणे करू, नंतर एक्स-55 (किंवा 65) \"नियंत्रण प्रणाली\" गरम HOTAS तिकीट आहे.\nखालील वापरकर्ता (चे) धन्यवाद म्हणाला: Gh0stRider203\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 21\nप्रथम बंद, मोठ्याने हसणे मी शेतात सुमारे त्यामुळे ट्रेनमध्ये .पण नाही होते याची खात्री आहे मोठ्याने हसणे आपले डुप्लिकेट पोस्ट काढले\nमी सर्व काठी गेला काय माहित नाही पण मी माझ्या तोल ढासळला आणि माझे हात बंद स्नॅप, हँडल वर परत आले, तेव्हा गळा भाग पर्दाफाश जाणून घ्या.\nएक गळा साठी crappy रचना, तुम्ही मला विचाराल तर ... मी काही वैद्यकीय टेप वापरून तात्पुरत्या दुरुस्ती करणे व्यवस्थापित पण आपण त्या आहे चुकीचे वाटते कायमची मला माहीत नाही.\nतरी काठी न करता, गळा निरुपयोगी आहे. मी काठी वापरत आहे एक सेकंद, पुढील मी ते बग फळांपासून तयार केलेले पेय निवडा (एक गोष्ट मी माझ्या अपार्टमेंट सर्वात द्वेष उद्गार roaches आहे. मी शहराचे नाव आहे पण त्या स्पष्टपणे चांगला नाही म्हणून मी विचार केले आहे माझे पुढील कॉल, मी परत खाली सेट आणि तो काम करणे सोडल्याचे तालुका आरोग्य विभाग आहे).. मी फक्त येणार सारखे आहे\nमालक / मुख्य कार्यकारी अधिकारी\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 21\nPAYSON लिहिले: हाय कुमार, मी एक्स-45 होते कधीच मी संदेश क्रॉसओवर केलं वाटत. मी कधीही मालकीच्या केलेले सर्व Saitek चे क्ष 55 HOTAS नियंत्रण प्रणाली आहे. ते काहीसे \"जोडले\" असणे आवश्यक आहे. मी फक्त एक काठी आणि मी माझ्या Logitech सर्वोच्च आहे, जे आपण एक विमानाचा मार्गदर्शन तर गरज आहे परत जा इच्छित काही बटणे होते तर. आपण (मी) काही गंभीर AI विरुद्ध कोणत्याही लढणे करू, नंतर एक्स-55 (किंवा 65) \"नियंत्रण प्रणाली\" गरम HOTAS तिकीट आहे.\nकोण मला हवेत लढणे हवाई भरपूर करू नका पाहू, पण मी 55 सर्व कार्ये प्रेम मी शक्यतो jumbos उडता असताना ... मी तेही किती प्रत्येक बटण एक वापर आला मोठ्याने हसणे\nमी काय असल्याने अधिक ILS पध्दती या दिवस (मी ILS द्वेष करण्यासाठी वापरले आता मी मोठ्याने हसणे प्रेम), मी GPS मधील NAV1 स्विच करण्यासाठी autopilot आणि एनएव्ही जवळ एक दोन व्यवस्था असतात. मी खरोखर मी 45 होती तेव्हा कीबोर्ड वापरले गोष्ट वाटते, ATC बोलू / बंद द अप्पू चालू, आणि कदाचित 1 किंवा 2 लहान गोष्टी होते मोठ्याने हसणे\nमालक / मुख्य कार्यकारी अधिकारी\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 14\n1 वर्ष 5 महिने पूर्वी #221 by PAYSON\n मी चूक मंच मध्ये असणे आवश्यक आहे. अनेक दिलगीर आहोत .चिं\nखालील वापरकर्ता (चे) धन्यवाद म्हणाला: Gh0stRider203\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nपरवानगी नाही: नवीन विषय तयार करण्याची.\nपरवानगी नाही: उत्तर आहे.\nपरवानगी नाही: attachements जोडण्यासाठी.\nपरवानगी नाही: आपला संदेश संपादित करण्यासाठी.\nमंडळ श्रेणी Rikoooo बद्दल - आपले स्वागत आहे नवीन सदस्य - सुचना बॉक्स - घोषणा उड्डाण अनुकार मंच - FSX - FSX स्टीम संस्करण - FS2004 - Prepar3D - एक्स-प्लेन मीडिया - स्क्रीनशॉट - व्हिडिओ विमानगृह चर्चा - फ्लाय ट्यून - काय आणि आज आपण जेथे उडत होता - स्थावर विमानचालन इतर उड्डाण simulators - फ्लाइट गियर फ्लाइट सिम्युलेटर - - FlightGear बद्दल - DCS मालिका - बेंचमार्क सिम\nFSX - FSX स्टीम संस्करण\nवेळ पृष्ठ तयार करण्यासाठी: 0.135 सेकंद\nद्वारा समर्थित Kunena मंच\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://dateycollege.in/dhurve-aword/", "date_download": "2018-08-18T08:15:39Z", "digest": "sha1:NRPRU7NWIIQCVSJHHCGOTVTI4NAUN3MH", "length": 4485, "nlines": 47, "source_domain": "dateycollege.in", "title": "डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार - बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ", "raw_content": "बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ\n(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित )\nडॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार\nडॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार\nप्रा. हरिदास माणिकराव धुर्वे (एम.कॉम., एम.फिल.) -\nबाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. संशोधन कार्यात आवड असल्यामुळे डिसेंबर २०१७ ला यु.एस.ए.च्या आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये Online Research Paper पाठविला होता. त्यांचा Impact of Mall Culture on Indian Youth या विषयावरील संशोधन लेख जागतिक स्तरावरून प्रकाशित करण्यात येवून Excellence म्हणून अवार्ड करण्यात आला. तसेच संबधित संशोधन लेख प्रा. धुर्वे यांचे नावासह या जागतिक journal चे मुखपृष्ठावर घेवून त्याची दखल घेण्यात आली. बंगलोर येथील International Institute for Social And Economic Reforms, Bengaluru ह्या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेने त्यांना Teaching, Publication and Research ह्या कार्यासाठी “डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार” जाहीर केला.\nदि. ०२ जून २०१८ रोजी बंगलोर येथे मा. डी. एच. शंकरमूर्ती, कर्नाटक विधानसभा अध्यक्ष, मा. डॉ. व्ही. एच. शिवाप्पा सदस्य, नीती आयोग, भारत सरकार, सुप्रसिद्ध फिल्म निदेशक श्री. नरेंद्र मगडी, आणि सुप्रसिद्ध कन्नड फिल्म अभिनेत्री कु. राजेश्वरी अन्नाके यांच्या हस्ते व उपस्थितीत या पुरस्काराचे प्रदान करण्यात आले.\nवाणिज्य महाविद्यालय यवतमाळ ट्रस्टचे अध्यक्ष विनायक दाते, सर्व पदाधिकारी, प्राध्यापक वर्ग ह्यांनी धुर्वे सरांचे अभिनंदन केले.\nCopyright © 2018 बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.solapurcorporation.gov.in/(X(1)S(vf25lc55vrylr5454iwjzu45))/English/eng%20smc%20rti.aspx", "date_download": "2018-08-18T08:46:58Z", "digest": "sha1:PKDU47UAJC5S3HJRIVME2NXWOAF4RXVC", "length": 10203, "nlines": 101, "source_domain": "www.solapurcorporation.gov.in", "title": "Welcome to Solapur Municipal Corporation, Solapur.", "raw_content": "\n1 माहिती अधिकार अधिनियन २००५ इंग्रजी Open Link\n2 माहिती अधिकार अधिनियन २००५ मराठी Open Link\n3 दि 01-06-2015 च्या लोकशाही दिनाकरिता प्राप्त झालेल्या तक्रारी Open Link\n4 दि 05-05-2015 च्या लोकशाही दिनाकरिता प्राप्त झालेल्या तक्रारी Open Link\n5 दि 06-04-2015च्या लोकशाही दिनाकरिता प्राप्त झालेल्या तक्रारी Open Link\n6 दि 06-07-2015 च्या लोकशाही दिनाकरिता प्राप्त झालेल्या तक्रारी Open Link\n7 माहिती अधिकार दिनाबाबत माहिती Open Link\n8 लोकशाही दिनाबाबत माहिती Open Link\n9 दि 03-08-2015 च्या लोकशाही दिनाकरिता प्राप्त झालेल्या तक्रारी Open Link\n10 दि. 07-09-2015 च्या लोकशाही दिनाकरिता प्राप्त झालेल्या तक्रारी Open Link\n11 दि. 05-10-2015 च्या लोकशाही दिनाकरिता प्राप्त झालेल्या तक्रारी Open Link\n12 दि. 02-11-2015 च्या लोकशाही दिनाकरिता प्राप्त झालेल्या तक्रारी Open Link\n13 दि. 01-12-2015 च्या लोकशाही दिनाकरिता प्राप्त झालेल्या तक्रारी Open Link\n14 दि. 01-01-2016 च्या लोकशाही दिनाकरिता प्राप्त झालेल्या तक्रारी Open Link\n15 दि. 08-03-2016 च्या लोकशाही दिनाकरिता प्राप्त झालेल्या तक्रारी Open Link\n16 दि. 04-04-2016 च्या लोकशाही दिनाकरिता प्राप्त झालेल्या तक्रारी Open Link\n17 दि. ०२-०५-२०१६ च्या लोकशाही दिनाकरिता प्राप्त झालेल्या तक्रारी Open Link\n18 दि. ०6-०6-2016 च्या लोकशाही दिनाकरिता प्राप्त झालेल्या तक्रारी Open Link\n19 दि. ०4-०7-2016 च्या लोकशाही दिनाकरिता प्राप्त झालेल्या तक्रारी Open Link\n20 दि. 01-०8-2016 च्या लोकशाही दिनाकरिता प्राप्त झालेल्या तक्रारी Open Link\n21 दि. ०6-०9-2016 च्या लोकशाही दिनाकरिता प्राप्त झालेल्या तक्रारी Open Link\n22 दि. ०3-10-2016 च्या लोकशाही दिनाकरिता प्राप्त झालेल्या तक्रारी Open Link\n23 दि. ०7-11-2016 च्या लोकशाही दिनाकरिता प्राप्त झालेल्या तक्रारी Open Link\n24 दि. ०5-12-2016 च्या लोकशाही दिनाकरिता प्राप्त झालेल्या तक्रारी Open Link\n25 दि. ०2-01-2017 च्या लोकशाही दिनाकरिता प्राप्त झालेल्या तक्रारी Open Link\n26 दि. ०6-03-2017 च्या लोकशाही दिनाकरिता प्राप्त झालेल्या तक्रारी Open Link\n27 दि. 03-04-2017 च्या लोकशाही दिनाकरिता प्राप्त झालेल्या तक्रारी Open Link\n28 दि. 02-05-2017 च्या लोकशाही दिनाकरिता प्राप्त झालेल्या तक्रारी Open Link\n29 दि. 05-06-2017 च्या लोकशाही दिनाकरिता प्राप्त झालेल्या तक्रारी Open Link\n30 दि 03-07-2017 च्या लोकशाही दिनाकरिता प्राप्त झालेल्या तक्रारी Open Link\n31 दि 07-08-2017 च्या लोकशाही दिनाकरिता प्राप्त झालेल्या तक्रारी Open Link\n32 दि. ४-९-१७ च्या लोकशाहीदिनाकरिता प्राप्त झालेल्या तक्रारी Open Link\n33 सा.प्र.वि माहिती अधिकार मधील १ ते १७ ची माहिती Open Link\n34 सा.प्र.वि माहिती अधिकार मधील कलम ४ (१) ब (१०) ची माहिती Open Link\n35 शहर हद्दवाढ कार्यालय माहिती अधिकारी कलम ४ (ब) मधील १ ते १७ ची माहिती . Open Link\n36 क्रीडा कार्यालय माहिती अधिकारी कलम ४ (ब) मधील १ ते १७ व कलम ४ (क) व (ड) ची माहिती . Open Link\n37 क्रीडा कार्यालय माहिती अधिकारी कलम ४ (ब) मधील १ ते १७ व कलम ४ (क) व (ड) ची माहिती . Open Link\n38 नगररचना विभागाकडील सहा. माहिती अधिकारी व जनमाहिती अधिकारी ची माहिती Open Link\n39 स्थानिक संस्था कर कार्यालय माहिती अधिकारी कलम ४ (ब) मधील १ ते १७ व कलम ४ (क) व (ड) ची माहिती . Open Link\n40 स्थानिक संस्था कर कार्यालय माहिती अधिकारी कलम ४ (ब) मधील १ ते १७ व कलम ४ (क) व (ड) ची माहिती . Open Link\n41 अंतर्गत लेखापरीक्षक कार्यालय माहिती अधिकारी कलम ४ (ब) मधील १ ते १७ व कलम ४ (क) व (ड) ची माहिती . Open Link\n42 अंतर्गत लेखापरीक्षक कार्यालय माहिती अधिकारी कलम ४ (ब) मधील १ ते १७ व कलम ४ (क) व (ड) ची माहिती . Open Link\n43 संगणक विभागाकडील सहा.माहिती अधिकारी व जनमाहिती अधिकारी ची माहिती . Open Link\n44 मुख्यलेखापरिक्षक कार्यालय माहिती अधिकारी कलम ४ (ब) मधील १ ते १७ व कलम ४ (क) व (ड) ची माहिती . Open Link\n45 मुख्यलेखापाल विभागाकडील सहा.माहिती अधिकारी व जनमाहिती अधिकारी ची माहिती . Open Link\n46 विभागीय कार्यालय क्र. ४ माहिती अधिकारी कलम ४ (ब) मधील १ ते १७ व कलम ४ (क) व (ड) ची माहिती Open Link\n47 अन्न व परवाना विभाग कार्यालय माहिती अधिकारी कलम ४ (ब) मधील १ ते १७ व कलम ४ (क) व (ड) ची माहिती . Open Link\n48 अन्न व परवाना विभाग कार्यालय माहिती अधिकारी कलम ४ (ब) मधील १ ते १७ व कलम ४ (क) व (ड) ची माहिती . Open Link\n49 मंडई विभाग कार्यालय माहिती अधिकारी कलम ४ (ब) मधील १ ते १७ व कलम ४ (क) व (ड) ची माहिती-I Open Link\n50 मंडई विभाग कार्यालय माहिती अधिकारी कलम ४ (ब) मधील १ ते १७ व कलम ४ (क) व (ड) ची माहिती II Open Link\n51 विभागीय कार्यालय क्र.६ माहिती अधिकारी कलम ४ (ब) मधील १ ते १७ व कलम ४ (क) व (ड) ची माहिती Open Link\n52 नागरी समुदाय विकास प्रकल्प कार्यालय माहिती अधिकारी कलम ४ ( ब ) मधील १ ते १७ व कलम ४ ( क ) व ( ड ) ची माहिती Open Link\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/25/29/Evalya-Evalya-Waluche.php", "date_download": "2018-08-18T08:36:47Z", "digest": "sha1:2MOBN37H736MENF42QK62IQ5FEW7RGPS", "length": 9592, "nlines": 170, "source_domain": "www.gadima.com", "title": "Evalya Evalya Waluche | इवल्या इवल्या वाळूचे | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nकालपुरुषा तु स्वत: थकशील,थेरडा होशील पण,आम्हाला म्हातारपण देणे कक्षेबाहेर आहे तुझ्या.\nआम्ही लढतच राहु.हे आव्हान घे माझे-एका कलाकाराचे\nगदिमांची बालगीते/बालकविता | Balgeete/Children Songs\nते तर घरकुल बाळूचे\nबाळू म्हणे की, इथेच लोळू....\nउन्हात तापू लागे वाळू\nबाळूला ती लागे पोळू\nत्यात घर होतं साळूचं\nएकदा पाऊस लागे वोळू\nभिजली वाळू, भिजले वेळू\nनदीस येऊ लागे पूर\nभुरकन खाली आली साळू\nआणि म्हणाली, ‘‘उठ रे बाळू’’\nबाळू निजला, जैसा धोंडा\nतोवर आला मोठ्ठा लाेंढा\nसाळूने मग केले काय\nचोचीत धरला त्याचा पाय\nवेळू वरती नेले उंच\nआणि मांडला नवा प्रपंच\nबाळूचे घरकुल वाहून गेले\nसाळूचे घरटे राहून गेले\nसाळू म्हणते, गाऊ खेळू\nबाळू म्हणतो, इथेच लोळू\nगीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते तेच छंदासह....\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nआई व्हावी मुलगी माझी\nआवडती भारी मला माझे आजोबा\nउचललेस तू मीठ मूठभर\nएक कोल्हा बहु भुकेला\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://punerispeaks.com/author/admin/page/58/", "date_download": "2018-08-18T08:41:07Z", "digest": "sha1:MAJ3IZZLPRGAMKBT65OXU67HG4QHXJRS", "length": 9444, "nlines": 115, "source_domain": "punerispeaks.com", "title": "S Patil, Author at Puneri Speaks - Page 58 of 63", "raw_content": "\nनागपूरची कु. दिव्या देशमुख ला १२ वर्षाखालील “जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत” सुवर्णपदक\nभारतातील लोक बुद्धिमान लोकांच्या यादीत कायम वरचढ ठरत आलेले आहेत, याचे उदाहरण म्हणजे भारतीय लोकांचे सध्या जागतिक स्तरावर असेलेले स्थान. … Read More “नागपूरची कु. दिव्या देशमुख ला १२ वर्षाखालील “जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत” सुवर्णपदक”\nराज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले\nकोणत्याही राजकारण्याची सुरुवात ही ग्रामपंचायती पासूनच झालेली असते, काही त्याला अपवाद असतील पण बहुदा सगळे नेते मंडळी आपापल्या भागातील ग्रामपंचायतीपासूनच … Read More “राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले”\nअन…पोलिसही सरसावले सुप्रियाताई बरोबर सेल्फी काढायला\nमुंबईचा लालबाग गणपतीच्या दर्शनाला रोज कोणीना कोणी प्रसिद्ध व्यक्तिमत्व येतेच. अशाच गणेशोत्सवात गणपती बाप्पाचा म्हणजेच खास लालबाग गणपती चा आशीर्वाद … Read More “अन…पोलिसही सरसावले सुप्रियाताई बरोबर सेल्फी काढायला”\nमाधुरी दीक्षित निर्मित पहिला मराठी चित्रपट लवकरच पडद्यावर\nसध्या मराठी चित्रपटसृष्टीला सुगीचे दिवस आलेत असे म्हणायला हरकत नाही. संजय लीला भन्साळी, जॉन इब्राहिम, प्रियांका चोप्रा आणि आपला मराठमोळा … Read More “माधुरी दीक्षित निर्मित पहिला मराठी चित्रपट लवकरच पडद्यावर”\nपुण्यातुनच गणपतीची आवड निर्माण झाली- अमृता\nपुणे म्हणजे सार्वजनिक गणपती स्थापनेचे प्रतीक, घरोघरी गणपती, सार्वजनिक गणपती मंडळ असा धुमधाम 11 दिवस चालुच असतो. मराठी सिनेअभिनेत्री अमृता … Read More “पुण्यातुनच गणपतीची आवड निर्माण झाली- अमृता”\n‘दीपा, आपला दीपक गेला…….’ दुपारी अच्युत गोडबोलेंचा फोन आला……नेहमीप्रमाणे लिखाणाविषयी काही सूचना असणार अशा विचारानं मी फोनवर बोलणार तोच ते … Read More “दीपा’ दुपारी अच्युत गोडबोलेंचा फोन आला……नेहमीप्रमाणे लिखाणाविषयी काही सूचना असणार अशा विचारानं मी फोनवर बोलणार तोच ते … Read More “दीपा\nहृतिक रोशन ने माझी माफी मागावी- कंगना\n“आप की अदालत” हा कार्यक्रम म्हणजे सर्व नेते, सेलिब्रिटी मंडळींसाठी खुले दालनच, यात आलेला प्रत्येकजण विवादास्पद बोलतोच. त्यातच भर टाकलेली … Read More “हृतिक रोशन ने माझी माफी मागावी- कंगना”\nपिंपरी-चिंचवड चे विद्यमान विरोधी पक्षनेते मा. योगेश बहल मुंबईच्या अतिवृष्टीतून थोडक्यात बचावले\nपिंपरी-चिंचवड चे माजी महापौर आणि विद्यमान विरोधी पक्षनेते योगेश बहल नुकतेच मुंबई महापुराच्या तडाख्यातून बचावले असल्याचे सांगितले. परवा-परवाचा पाऊस म्हणजे … Read More “पिंपरी-चिंचवड चे विद्यमान विरोधी पक्षनेते मा. योगेश बहल मुंबईच्या अतिवृष्टीतून थोडक्यात बचावले”\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची ऐतिहासिक परंपरा\nपुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मूर्तीचा इतिहास … सन १८९३ :- श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे … Read More “श्रीमंत दगडूशेठ गणपतीची ऐतिहासिक परंपरा”\nलारा दत्ता-भूपती ने आपल्या पतीचे ग्रँडस्लॅम मध्ये कमावलेले टॉवेल वापरले पाऊस अडवायला…\nबायका काय करतील याचा नेम नाही, अशीच घटना घडलीय काल महेश भूपती च्या घरी. लारा दत्ता-भूपती हिने मुंबईत पडलेल्या मुसळधार … Read More “लारा दत्ता-भूपती ने आपल्या पतीचे ग्रँडस्लॅम मध्ये कमावलेले टॉवेल वापरले पाऊस अडवायला…”\nAsian Games 2018: आशियाई क्रीडा स्पर्धा वेळापत्रक, प्रक्षेपण, कबड्डी संघ वेळापत्रक\nपिंपरीत प्रियकराने ‘Shivde, I Am Sorry’ चे ३०० फलक लावले, कोण आहे शिवडे\nअटल बिहारी वाजपेयी माहिती, अटल बिहारी वाजपेयी विशेष , अटल बिहारी वाजपेयी मराठी, अटल बिहारी वाजपेयी कविता\nपुणे तिथे काय उणे: देशात राहण्यासाठी पुणे शहर अव्वल स्थानी\nआरक्षण – एक शोधनिबंध | आरक्षण माहिती | आरक्षण म्हणजे काय\nRaj Thackeray VS Ajit Pawar: पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळ्यात एकमेकांवर टीका, वॉटरकप 2018 विजेते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95", "date_download": "2018-08-18T08:58:42Z", "digest": "sha1:5UK6MRW3E36WMSPVQIATONL3HM3ZCEEP", "length": 3551, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अमेरिकन राष्ट्राध्यक्ष प्राथमिक निवडणूक - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:अमेरिकन राष्ट्राध्यक्ष प्राथमिक निवडणूक\n\"अमेरिकन राष्ट्राध्यक्ष प्राथमिक निवडणूक\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\n२०१६ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष प्राथमिक निवडणूका\n२०१६ डेमॉक्रॅटिक पक्ष प्राथमिक निवडणूक\n२०१६ रिपब्लिकन पक्ष प्राथमिक निवडणूक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ फेब्रुवारी २०१६ रोजी २३:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/jogia/playsong/26/Maitarani-Ga-Sang-Sajani.php", "date_download": "2018-08-18T08:34:51Z", "digest": "sha1:HXOIKK5I5UQ42O2JIA6XFI7I4MTL6FXA", "length": 12265, "nlines": 153, "source_domain": "www.gadima.com", "title": "Maitarani Ga Sang Sajani -: मैतरणी ग सांग साजणी : Jogia : जोगिया", "raw_content": "\nचंदनी चितेत जळला चंदन,\nजोगिया हा गदिमांचा पहिला काव्यसंग्रह,प्रस्तावनेत गदिमा म्हणतात जीवनव्यवसाय म्हणून लेखणीशी अनेकदा बेईमानी करण्याचा प्रसंग मजवर आला-येतो आहे.या संग्रहातील कविता ही मात्र व्रतस्थपणे केलेली काव्यनिर्मिती आहे.या संग्रहाला जोगिया असे नाव म्हणूनच द्यावेसे वाटले.\nगदिमांच्या जोगिया संग्रहातील निवडक १६ कवितांना चाली लावल्या आहेत सुरेशदा देवळे यांनी,गायक आहेत श्रीधर फडके,उत्तरा केळकर,रविंद्र साठे,चारुदत्त आफळे,ज्ञानदा परांजपे.गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी या अल्बमची निर्मिती केली आहे.\nमैतरणी ग सांग साजणी\nअल्बम: जोगिया Album: Jogia\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nमैतरणी ग सांग साजणी गुपीत समदं मला\nकशाचा ध्यास तुला लागला\nझुंजुरकाचं काखंवरती घेऊनिया घागर\nगुरं वासरं पार पिटाळुन वरल्या माळाकडं\nशिरवाळीचं ओघळीतल्या निवत्या वाळूवर\nकां घुटमळशी ग कडुसं पडल्यावर\nकां अल्याड चुकती रानिं तुझीं वासरं\nती रोजच घुमते शीळ कुणाची बरं\nकरंजाखालीं कोण भेटतौ शमलेवाला तुला\nकशाचा ध्यास तुला लागला\nपिंपरणीचीं कवळीं पानं उन्हात व्हावीं तशी\nकशानं मलूल झालिस अशी\nगालांवरती रसरस करिती मुरमाच्या पुटकुळ्या\nकशी विरलि ग नवीन चोळी बाई छातीवर\nघे उरकुन आतां लौकर साखरपुडा\nह्यो खुळ्या पिरतीचा रस्ता लइ वांकडा\nह्यो लागो परता बोल तुला वावडा\nपिकल्या आंब्यावरचा राघू चुकवुन जाइल तुला\nद्वाड ह्यो इष्काचा मामला\nमहाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.\nसंसारी मी केला तुळशीचा मळा\nसुरावट भाषेहून रांगडी - जत्रेच्या रात्री\nझोपडीच्या झापा म्होरं - रानातली अंगाई\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-29-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-08-18T08:01:41Z", "digest": "sha1:WDSMKGLYGJRZ3MVBAIBA3H3NFMQBI436", "length": 5547, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गोडोलीत 29 हजाराची चोरी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगोडोलीत 29 हजाराची चोरी\nसातारा शहरातील गोडोली येथील बंद घरातील 29 हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस चौकीला नोंद झाली आहे.\nगोडोली येथील कोयना सन्मित्र सोसायटीत असलेले बंद घर चोरट्यांनी फोडले आहे. तक्रारदार हे कामानिमीत्त पुणे येथे राहण्यास आहेत. ते दि. 18 फेब्रुवारीला घर बंद करून पुण्याला गेले होते. त्यानंतर ते दि. 4 ऑगष्ट रोजी साताऱ्यात परत आल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्यांनी घराच्या खिडकीचा गज कापुन 29 हजार रुपयाचे एलसीडी व इतर साहीत्य चोरल्याची तक्रार अनिल आत्माराम खेर रा. कोयना सन्मित्र सोसायटी, गोडोली यांनी दिली आहे. दाखल चोरीचा तपास पोलिस करत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशिर्डी मतदार संघाच्या विकासाला शेजारच्यांची मदत होत असेल तर वाईट वाटुन घेवू नका – डॉ.सुजय विखे पाटील\nNext articleरेडिओलॉजिस्टच्या मागण्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE-19-%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%86%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-18T08:01:43Z", "digest": "sha1:QH37VROUKSSRXCIMPSEJ4RU2FGL5UNFN", "length": 5498, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सासवडला 19 ऑगस्ट रोजी महाआरोग्य शिबिर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसासवडला 19 ऑगस्ट रोजी महाआरोग्य शिबिर\nजवळार्जून- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 19 ऑगस्ट रोजी सासवड येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पुरंदर तालुक्‍यातील 10 हजार 500 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. नायगाव येथे 8 ऑगस्ट सकाळी 9 वाजता जिल्हा परिषदेचे सदस्य रोहीत पवार यांच्या उपस्थितीत शिबिराचे आयोजन केले आहे. याशिवाय कोळविहिरे येथे सकाळी 10.30 वाजता, वाळूंज येथे दुपारी 12 वाजता, वाघापूर येथे दुपारी 2 वाजता, परिंचे येथे दुपारी 4 वाजता, कोडीत येथे सांयकाळी 5.30 वाजता व जेजुरी येथे सायंकाळी 7 वाजता शिबिराचे आयोजन केले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रसचे पुरंदर तालुका अध्यक्ष माणिक झेंडे पाटील यांनी दिली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदुग्धवर्धक पदार्थ (गॅलॅक्टोगॉग्ज) (भाग :२)\nNext articleयशवंत विद्यालयातील विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/fake-controversy-created-over-ishrat-affidavits-chidambaram-9845", "date_download": "2018-08-18T08:28:52Z", "digest": "sha1:NJQW5DEAHQIB6ZP6LFVY2ZLY7IX3MM7O", "length": 13102, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "'Fake controversy' created over Ishrat affidavits: Chidambaram इशरतप्रकरणी साक्षीदाराला प्रश्नोत्तराची शिकवण | eSakal", "raw_content": "\nइशरतप्रकरणी साक्षीदाराला प्रश्नोत्तराची शिकवण\nगुरुवार, 16 जून 2016\nनवी दिल्ली - इशरत जहॉं प्रकरणाशी संबंधित गहाळ झालेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी स्थापन केलेली चौकशी समिती या प्रकरणातील साक्षीदाराला शिकवणी देत असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.\nनवी दिल्ली - इशरत जहॉं प्रकरणाशी संबंधित गहाळ झालेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी स्थापन केलेली चौकशी समिती या प्रकरणातील साक्षीदाराला शिकवणी देत असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.\n2004 मध्ये इशरत जहॉंसह अन्य चार दहशतवाद्यांसोबत चकमक झाली होती. यामध्ये इशरतसह सर्वांना ठार करण्यात आले होते. त्यानंतर अलिकडेच या प्रकरणाशी संबंधित प्रतिज्ञापत्र बदलल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे गहाळ झाली होती. समिती स्थापन करून त्याद्वारे गहाळ कागदपत्रांसंबंधांची चौकशी करण्यात येईल असे आश्‍वासन 10 मार्च रोजी गृहमंत्री राजनाथसिंह यांनी लोकसभेत दिले होते. त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयातील अधिकारी बी. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. दरम्यान एका इंग्रजी वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने या प्रसाद यांना 25 एप्रिल रोजी अन्य एका विषयासंबंधी माहिती घेण्यासाठी दूरध्वनी केला होता. दूरध्वनीवर संभाषण सुरू असताना प्रसाद यांना इशरत जहॉं प्रकरणाशी संबंधित साक्षीदार असलेले अधिकारी अशोक कुमार यांचा दुसऱ्या एका मोबाईलवर फोन आला. त्यानंतर त्यांनी पहिला फोन सुरू ठेवत दुसऱ्या फोनवर बोलण्यास सुरुवात केली. \"मला हे विचारायचे आहे की हा कागद पाहिला का त्यावर हा पेपर पाहिला नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे‘, असे संभाषण त्यांच्यामध्ये झाल्याचा दावा प्रतिनिधीने केला आहे. तसेच हे संपूर्ण संभाषण प्रतिनिधीच्या फोनमध्ये रेकॉर्ड झाल्याचेही वृत्तात म्हटले आहे.\nदरम्यान प्रसाद यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तर \"इशरत जहॉं प्रकरणातील प्रतिज्ञापत्रांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार बनावट वाद निर्माण करत आहे‘, अशा प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केल्या आहेत.\nपिंपळवंडीला मानव-बिबट सहजीवन जनजागृती\nजुन्नर - पिंपळवंडी ता.जुन्नर येथे मानव व बिबट संघर्ष व सहजीवन याविषयी मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती करण्यात आली. जुन्नर वन विभाग तसेच...\nचिंचवडमध्ये रविवारी रंगणार महिला प्रेरणा संमेलन\nवाल्हेकरवाडी - स्वयंसिद्धा प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड शहर) आणि प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि. 19 ऑगस्ट) चिंचवड...\nडिजिटायझेशन'ने दुर्मिळ ग्रंथही चिरकाल \nजळगाव ः पुस्तकांचा खजिना सांभाळणाऱ्या अनेक वाचनालयांना शतकोत्तरी परंपरा लाभलेली आहे. परंतु काळानुरूप ग्रंथालयांनी तंत्रज्ञानाशी जुळवून, त्या दिशेने...\nपंतप्रधानांकडून केरळसाठी 500 कोटींची मदत जाहीर\nतिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल...\nसमस्या सोडवण्यासाठी नाशिकला भरणार शिक्षकांचा दरबार\nयेवला - शिक्षकांच्या विविध रखडलेल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी नाशिकमध्ये विभागातील शिक्षकांचा शिक्षक दरबार गुरुवारी (ता.२३) आयोजित करण्यात आला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.manashakti.org/index.php?q=story/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-08-18T09:24:15Z", "digest": "sha1:BCWFVCICQMQX7OLZBLZIBVOWQMVJEJ3X", "length": 8233, "nlines": 97, "source_domain": "www.manashakti.org", "title": "सोमवारची शाश्र्वत शक्ती | Manashakti Research Centre", "raw_content": "\nयेथे सातत्यपूर्ण मनःशांती मिळवण्याच्या सोप्या व व्यावहारीक उपायांची माहिती आहे.\nHome » Weekly Story » सोमवारची शाश्र्वत शक्ती\nउग्रहांच्या परोक्ष रांगेत सौम्य सोमचंद्र बसला होता. सूर्यानंतर नारदांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. तो तोंड लपवायला लागला, तसे नारद त्याला म्हणाले, “अरे तुझ्या नावानंसुध्दा पृथ्वीवरची लोकं एक वार पाळतात, त्याला सोमवार म्हणतात. “\nचंद्राच्या मुखावर चांदणं विखुरलं.\nनारदांनी त्याला म्हटलं, “पृथ्वीवरचे लोक तुझी मूर्ती करतात. ती ही अशी. आणि तुझ्या स्तुतीचा ऋग्वेदातील जो मंत्र म्हणतात तो असा -\nआ प्यायस्व समेतु ते विश्र्वत: सोम वृष्ण्यम्\nत्यात मागता, “हे सोमा, तू प्रवृध्द हो. तुझ्या शौर्यभराचा प्रवाह चहूकडून चालू होवो. जिथे अनेक सत्व-पराक्रम एकवटले असतील, तिथे तुझा वास असतो. “\n“पृथ्वीवरचे काही लोक मला भेटायला आले होते. “चंद्र सांगायला लागला, “तेव्हा त्यांच्यापैकी कोणीतरी सांगत होते की, पृथ्वीवरचे लोक मला चंचल समजतात म्हणून. मग ते माझी शूर म्हणून कशी प्रार्थना करतात\nनारद हसून म्हणाले, “पृथ्वीवरच्या माणसांचं सोड तू. स्वत:च चंचल असल्यामुळे असं उलट सुलट बोलत असतात. रोहिणी नक्षत्र आणि तू नजीक असताना तर त्यांनी पृथ्वीवर एक गोष्ट रचली आहे. दक्ष प्रजापतीच्या सत्तावीस कन्या त्यानं तुला दिल्या, आणि त्यातली रोहिणी फक्त तुला आवडते. सत्तावीस नक्षत्रं आहेत आणि त्यातील रोहिणी तुझ्याजवळ आहे, हे ठसवण्यासाठी शहाण्या पूर्वजांनी ती गोष्ट कथेच्या रूपानं सांगितली, हे काही हल्लीच्या लोकांच्या लक्षात येत नाही. “\nचंद्राच्या मुखावर शिशिराचं चांदणं पसरलं. तो म्हणाला, “अंधारातसुध्दा धीर बाळगायला मदत करण्याचा माझा संदेश हा शुभकारक आहे. शिवकारक आहे. “\nनारद मान डोलवून म्हणाले, “हां, ती शिवकारक सूचना मात्र माणसं पाळतात. शिवाचं व्रत सोमवारी करतात. शिव म्हणजे शुभ. काहीतरी चांगलं व्रत करण्याचं शिवव्रत तुला जोडलं आहे , तुझं भाग्य आहे, प्रदोष म्हणजे दिवसभर भोजन आणि रात्री उपवास. शुध्द किंवा वद्य त्रयोदशीला सोमवार आला तर सोमप्रदोष, तो विशेष फलप्रद मानतात. निष्ठा एकाग्र करण्याची ती एक चांगली रीत आहे. “\nमग नारदानं माहिती सांगितली, “कुंडलीत चंद्र अनिष्ट असेल तर सोमवारी शिव-पार्वतीची पूजा करावी. शिवाला वर्षभर सोमवारी तूप द्यावं. तिळानं भरलेलं सुवर्णपात्र लायक गरीबांना दान द्यावं. सोमवारी अष्टमी असेल तेव्हा सोमपूजाही करावी. आठ ज्ञानी माणसांना वर्षभर भोजन द्यावं आणि रुप्याचं शिवलिंग दान करावं.” अशी अनेक व्रतं नारदांनी सांगितली.\nचंद्र म्हणाला, “भोळसट समजुती सोडून माझ्या नावानं शुभपूजा म्हणून शिवपूजा लोक करत असतील, तर चांगलंच आहे.”\nनारदानं आश्र्वासन दिलं, “तशा काही चांगल्या प्रथाही आहेत. सोमवारी बैलांना काम न देण्याची पध्दत होती. अजूनही बऱ्याच ठिकाणी आहे. कष्ट करणाऱ्या प्राण्याला सुटी मिळावी, हा त्यातला हेतू. “\nसमतेच्या या शिवप्रतीकांनी चंद्र प्रसन्न हसला. त्या हसण्यच्या लाटा, पृथ्वीवरच्या सात समुद्रांवर पसरल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2018-08-18T08:00:30Z", "digest": "sha1:CFGHCJTJ6YNDIBAPVYU2NZRYTH6KW5KT", "length": 12465, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कर्जमुक्‍ती व हमीभावाची विधेयके लोकसभेत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकर्जमुक्‍ती व हमीभावाची विधेयके लोकसभेत\nखा. राजू शेट्टी यांनी घेतला पुढाकार; पुढच्या अधिवेशनात चर्चा\nनगर – शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीचे विधेयक व शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाचा किमान लाभकारी हमीभाव मिळण्याचा अधिकार विधेयक ही दोन अशासकीय विधेयके खासदार राजू शेट्टी यांनी लोकसभेच्या पटलावर मांडली.\nकर्जमुक्तीच्या विधेयकामधे देशभरातील शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर आजमितीस असणारे सर्व प्रकारचे कर्ज (राष्ट्रीयकृत बॅंका, सहकारी बॅंका, पतसंस्था, अधिकृत/अनधिकृत खासगी सावकार, फायनान्स कंपन्या) माफ करण्याची मागणी करणारे हे विधेयक आहे. अनेक वर्षे तोट्याची शेती, नैसर्गिक आपत्ती, नापिकी, रोगराई, वारंवारच्या सरकारी हस्तक्षेपामुळे शेतीमालाच्या कोसळलेल्या भावामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. म्हणून या सर्व शेती कर्जाची कायदेशीर जबाबदारी घ्यावी. सरकारने अर्थसंकल्पीय तरतूद करून या संपूर्ण कर्जातून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे व पुन्हा नव्याने अशी काही असाधारण परिस्थिती निर्माण झाली, तरच कर्जमुक्तीचा विचार करण्यात येईल व त्यासाठी एक स्वायत्त आयोग गठीत केला जाईल. या आयोगाचे गठण पंतप्रधान, केंद्रीय कृषिमंत्री, लोकसभा व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते यांची समिती करेल, असे या विधेयकात म्हटले आहे.\nदुुसऱ्या विधेयकामधे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाला किमान लाभकारी हमीभाव मिळण्याचा अधिकाराचा समावेश आहे. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च शास्त्रशुद्ध पद्धतीने काढला जावा, यासाठी एक स्वायत्त आयोगाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव आहे. या आयोगामधे देशातील वेगवेगळ्या कृषी विद्यापीठांमधील तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, कृषी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी असतील. या सदस्यांची निवड देशाचे पंतप्रधान, केंद्रीय कृषिमंत्री, लोकसभा व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते यांची समिती करेल. यात उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा या सुत्रानुसार हमीभाव ठरविला जाईल.\nतसेच देशातील कुठल्याही बाजारपेठेत व्यापाऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किंमतीत शेतीमालाची खरेदी करता येणार नाही. केल्यास कायद्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तरतूद या विधेयकात आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर असेल, त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे. सरकारने हमीभावाने शेतीमालाची खरेदी केली नाही, तरीही बाजारपेठेमध्ये हमीभावापेक्षा कमी दराने कुठल्याही शेतीमालाची खरेदी करता येणार नसल्याने देशातील शेतकऱ्यांना या विधेयकाद्वारे भरभक्कम संरक्षक कवच मिळणार आहे.\nही दोन्हीही विधेयके लोकसभेच्या पटलावर खा. शेट्टी यांनी मांडली आहेत. संसदेच्या पुढील हिवाळी अधिवेशनात ही विधेयके चर्चेला येतील. या विधेयकांना देशातील 21 प्रमुख राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांनी आपला पाठिंबा दिलेला आहे. या दोन्ही विधेयकांची निर्मिती 20 व 21 नोव्हेंबर 2017 रोजी दिल्ली येथील संसद मार्गावर झालेल्या किसानमुक्ती संसदमध्ये झाली. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने देशभरामध्ये अनेक राज्यस्तरीय संमेलने घेऊन या विधेयकांवर सांगोपांग चर्चा झाली. त्यानंतर सर्वांच्या सूचनांचा आदर करून त्याचबरोबर 21 राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींबरोबर दोन संयुक्त बैठका घेऊन त्यांचीही मते व विधायक सूचना या विधेयकांमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशिक्षकांच्या पगाराबाबतचा शासन आदेश दुर्लक्षित\nNext articleदुग्धविकासात राज्य स्वयंपूर्णतेसाठी प्रयत्न : ना. महादेव जानकार\nआलिशान गाड्यांत फिरणाऱ्या नेतेमंडळींकडे ‘सोशल मीडिया’वरून गाऱ्हाणे\nआ. अौटींचे तडजोडीचे राजकारण संपवणार\nअनेक चोऱ्यांचा तपास प्रलंबित, कर्मचारी संख्या अल्प\nशालेय पोषण आहाराचा माल निकृष्ट\nठिबककडे ऊस उत्पादकांची पाठ\nविविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी नेवासा तालुक्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/meghalaya-the-history-of-earth-revealed-by-scientists-3/", "date_download": "2018-08-18T08:00:34Z", "digest": "sha1:A5OBZ5QLSAS2DVBRQ2ZMZPKWTNKH46UZ", "length": 11892, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#दखल: मेघालय युग आणि बोध (भाग ३) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#दखल: मेघालय युग आणि बोध (भाग ३)\nसध्या सुरू असलेल्या 11700 वर्षांच्या युगाचा सर्वांत प्रारंभिक कालखंडाचा शोध शास्त्रज्ञांना नुकताच लागला असून, त्याला मेघालय युग असे नाव देण्यात आले आहे. हा कालखंड केवळ सोयीसाठी केलेला नसून, पृथ्वीवरील मोठ्या फेरबदलाचा साक्षीदार म्हणून हा कालखंड आपल्या इतिहासाला, संस्कृतीला, जीवनशैलीला कलाटणी देणारा ठरला आहे. अशा कालखंडाच्या प्रारंभाच्या खुणा भारतात सापडाव्यात आणि मेघालयाचे नाव या युगाला देण्यात यावे, हा भारताच्या दृष्टीने मोठाच गौरव आहे तसाच तो जबाबदारीचे भान देणाराही आहे.\nयाच प्रदीर्घ कालखंडात मानवाने एवढी प्रगती केली, की जगाच्या सीमा ओलांडून अंतरिक्षातही आपले स्थान निर्माण करण्याचा त्याने प्रयत्न केला. हाच कालखंड असा आहे, ज्यात पृथ्वीवर पुन्हा एकदा मोठी संकटे येऊ घातली आहेत. जागतिक तापमानवाढीमुळे पृथ्वी अशीच गरम होत राहिली, तर इतिहासाचा आणखी एक टप्पा संपून नवा टप्पा सुरू होऊ शकतो, असे मानले जाते. म्हणजेच मेघालय युगाच्या प्रारंभापासूनचा विचार केला असता, पृथ्वीवरील धोक्‍यापासून धोक्‍यापर्यंतचा एक संपूर्ण कालखंड आपल्यापुढे उभा राहतो. तोच मेघालय कालखंड होय.\nमेघालयातील जीवनशैली आजही निसर्गपूरक आहे. त्यामुळे पृथ्वीला नव्या धोक्‍यांपासून कसे वाचवायचे, याचे उत्तर आपण मेघालयाच्या याच जीवनशैलीत शोधायला हवे. मानवी संस्कृती प्रगत होत जाते आणि आपण आपल्या पावलांची चिन्हे काळाच्या शिलालेखावर कोरून पुढे जात असतो. हा केवळ एक वाक्‌प्रचार नसून, मोठे सत्य या वाक्‍याला जोडलेले आहे. आपल्या पावलांची चिन्हे खरोखर शिळेवरच कायमस्वरूपी राहू शकतात. या पदचिन्हांवरूनच आपल्याला हे वास्तव सापडले आहे की, आपण ज्या युगात राहतो आहोत, ते एखाद्या राजा-महाराजाने सत्ता हाती घेतल्याच्या क्षणापासून सुरू झालेले नव्हते, तर ते युग दोनशे वर्षांच्या प्रचंडजागतिक दुष्काळामुळे सुरू झाले होते.\nमेघालयन युगामुळे मेघालयाचे नाव जगभरात गाजले आहे. ज्या गुहेत याचे पुरावे सापडले, ती समुद्रसपाटीपासून 1290 मीटर उंचीवर असून, मॉमलुह गुँफा असे तिचे नाव आहे. जगातील सर्वांत खोल आणि लांबलचक गुहांमध्ये या गुहेची गणती केली जाते. या गुहेच्या छतावरून ओघळत असलेल्या पाण्यातून जी खनिजे खाली सांडली, त्यातून नव्या खडकाचा जन्म झाला. या प्रक्रियेमुळेच कालविभाजन झाल्याचे मानले जाते. 4.6 अब्ज वर्षांचा पृथ्वीचा इतिहास शास्त्रज्ञ अनेक विभागांत विभागतात. कल्प, संवत, अवधि आणि युग अशी ही परिमाणे आहेत.\nकालखंडाचा सर्वांत छोटा भाग आहे ईपॉक. सध्या सुरू असलेला ईपॉक हा होलोसीन ईपॉक आहे. हे ईपॉक पुन्हा तीन कालखंडांमध्ये विभागले जाते. अप्पर, लोअर आणि मिडल. यातील तिसऱ्या म्हणजे लोअर कालखंडाला मेघालय युग असे नाव दिले गेले आहे. हे केवळ सोयीसाठी केलेले कालखंड नसून, पृथ्वीवरील मोठ्या बदलांचे निदर्शक आहेत. होलोसीन ईपॉकचे वैशिष्ट्य असे की, या कालखंडात मानवाने जगातील अन्य जीवजंतूंवर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले होते. त्यातही मेघालय युगाचे वैशिष्ट्य असे की, ते मानवी इतिहासातील मोठ्या उलथापालथीचे साक्षीदार बनले. सांस्कृतिक बदलाचे वाहक बनले. मानवी जीवनशैलीत मोठे फेरबदल याच कालखंडात झाले. या बदलाच्या खुणा मेघालयात आढळल्या, हा भारताचा गौरवच मानायला हवा.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#Happybirthday अभिनेत्री जेनेलिया डिसूजा-देशमुखचा आज वाढदिवस..\nNext articleखात्यामध्ये कमीत कमी बॅलन्स न ठेवल्यास बँकाकडून वसूल करण्यात आले 5 हजार कोटी रूपये\n#विशेष लेख: ऑनलाईनचा झटका (भाग १)\n#स्वातंत्र्यदिन विशेष: तंत्रसमृद्ध देशा… (भाग ३)\nस्वातंत्र्यदिन विशेष: तंत्रसमृद्ध देशा… (भाग १)\n#स्वातंत्र्यदिन विशेष: तंत्रसमृद्ध देशा… (भाग २)\n#विश्लेषण: घुसखोरांना कठोर संदेश (भाग-३)\n#विश्लेषण: घुसखोरांना कठोर संदेश (भाग-२)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/unseasonable-rain-khed-damages-crops-and-animals-110673", "date_download": "2018-08-18T08:50:56Z", "digest": "sha1:NAW7LQ45QRCMBKFYUCMUPSVNNLXZ37HF", "length": 10942, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "unseasonable rain in khed damages crops and animals पुणे - खेड तालुक्यात अवकाळी पावसाने पिके उध्वस्त, कोंबड्या गतप्राण | eSakal", "raw_content": "\nपुणे - खेड तालुक्यात अवकाळी पावसाने पिके उध्वस्त, कोंबड्या गतप्राण\nबुधवार, 18 एप्रिल 2018\nचास (पुणे) : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील वाडा तसेच वाळद परिसरात मंगळवारी संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले, सुमारे एक तास झालेल्या तुफान गारपिटीने प्रामुख्याने वाळद परिसरात मोठे नुकसान झाले.\nचास (पुणे) : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील वाडा तसेच वाळद परिसरात मंगळवारी संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले, सुमारे एक तास झालेल्या तुफान गारपिटीने प्रामुख्याने वाळद परिसरात मोठे नुकसान झाले.\nयेथील मळूदेवी विद्यालयाचे नवीन इमारतीचे पत्र्याचे छप्पर लोखंडी अँगलसह उखडले जाऊन सुमारे दहा फुटावर पडले तसेच शिंदे यांच्या घरावरील पत्रे कौले उडाली अनेकांची उन्हाळी बाजरीची पिके भुईसपाट झाली. काढलेले कांद्याचे पीक भिजले साठवलेला कांदा भिजला तिफणवाडी येथील कडलग यांच्या पोल्ट्रीतील 86 कोंबड्या वीजेच्या कडकडाटाने भेदरून मरण पावल्या. घटनास्थळी भेट देत पंचायत समितीचे सद्स्य भगवान पोखरकर यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी महसूल विभागाकडे केली आहे\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nबारामती - विद्या प्रतिष्ठानच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पुरस्कार\nबारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून सहाजण जखमी\nबेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने बंगळूरकडे जाणारी व्हीआरएलची आराम बस उलटून चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय...\nउंड्री - पाचव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजूर ठार\nउंड्री - गुलाम अली नगर गल्ली नं 6 दि.13 ऑगस्ट दु.12.30 वाजता एका निर्माणाधीन इमारतीचे काम सुरू असताना पाचव्या मजल्यावर पडून राजशेखर माशाले (वय 33...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.manashakti.org/index.php?q=story/4-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2018-08-18T09:16:09Z", "digest": "sha1:TLKUKYQISXQO5HCATXVEB4X3M7UXWZYC", "length": 5843, "nlines": 91, "source_domain": "www.manashakti.org", "title": "4.\tएकामुळे चार जिवंत | Manashakti Research Centre", "raw_content": "\nयेथे सातत्यपूर्ण मनःशांती मिळवण्याच्या सोप्या व व्यावहारीक उपायांची माहिती आहे.\n4.\tएकामुळे चार जिवंत\nचारी भाऊ बाजूला मरून पडले होते. ‘त्यापैकी कोणताही एक जिवंत कर. ‘म्हणून यक्ष धर्मराजाला परवानगी देत होता.\nधर्मराजाने क्षणाचाही विचार न करता नकुलाकडे बोट दाखवले. राजबिंडा, नीटस शांत झोपल्यासारखा नकुलाचा देह जसा काही धर्म-राजाच्या प्रेमाने पेशीपेशीतून हसत होता.\nयक्षाने चारही भावांना आधीच सल्ला दिला होता, की त्यांनी तळ्यातले पाणी पिऊ नये. तो सल्ला न जुमानता चारही भाऊ पाणी प्याले व मेले.\nएकट्या धर्मराजाने यक्षाला नीट उत्तरे दिली व खूष करून टाकले. पण कोणत्याही एका भावाला जिवंत करण्याचा हक्क त्याने धर्मराजाला दिला, तेव्हा धर्मराजाचे उत्तर त्याला पटले नाही. तो आश्चर्याने म्हणाला, “अरे त्या नकट्या पोराला घेऊन तू काय करणार भीम अर्जुन तुझे आधार. त्या दोघांपैकी कोणाही मुळे तुला तुझे राज्या परत मिळेल. “\nधर्माने नकारार्थी मान फिरवली आणि तो म्हणाला, “मला राज्या नको आहे. मला न्याय हवा आहे. सत्य हवे आहे. आणि न्यायाने मिळाले तर राज्य.”\n“नकुलाला पत्करून आणि अर्जुनाला डावलून, न्याय कसा साधणार\nधर्मराजाची दृष्टी अर्जुनाकडे गेली. उंच, नितळ, तेजस्वी, वीरभद्र अर्जुन. धर्मराजाचा जसा काही अखेरचा निरोप मिटल्या पापण्यांनी घेत होता. आपले मन अर्जुनाकडे ओढले जात आहे, हे लक्षात आल्यावर धर्मराजाचे डोळे तेथून निग्रहाने वळले. तो यक्षाकडे वळून म्हणाला, “यक्षराज, कुंती आणि माद्री या दोन आयांचे आम्ही पाच पुत्र. कुंतीचा मुलगा म्हणून मी जिवंत आहेच पण माद्रीचा एक तरी मुलगा जिवंत हवा. म्हणून नकुल जिवंत उठवा. “\nयक्षाची प्रज्ञा जिवंत झाली. त्याने नकुलाला जीवनस्पर्श दिला आणि मागोमाग तिन्ही भावांना. केवळ स्वार्थ मागितला म्हणजे स्वार्थ साधत नाही. पण नि:स्वार्थाच्या पोटात सर्व स्वार्थ साधतो.ही धर्माची विलक्षण प्रत्ययकारी सांगी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%95/", "date_download": "2018-08-18T09:06:58Z", "digest": "sha1:4FIZYSMLHDITXGXRSNDWC5PGCDLG7CU7", "length": 3648, "nlines": 65, "source_domain": "m4marathi.com", "title": "तालिबानी आतंक...... | m4marathi", "raw_content": "\nसापाला कितीही दुध पाजलं तरी तो डसल्याशिवाय रहात नाही,याचा प्रत्येय काल पाकिस्तानी सरकारला आला.\nज्या दहशतवादाला पाकिस्तान खतपाणी घालत होत तोच दहशतवाद पाकला आता जेरीस आणतोय.\nकाल पाकिस्तानात पेशावर मध्ये एका मिलेटरी शाळेवर भ्याड हल्ला केला ज्यामध्ये शाळेत असलेले १३२ विद्यार्थी आणि इतर १४१ व्यक्तींची गोळ्या घालून निर्घुण हत्या करण्यात आली.\nअतिशय कोवळ्या अंगांवरती ह्या सैतानांनी गोळ्या डागल्या.ह्या भ्याड हल्ल्याची जगभरातून निंदा होत आहे.\nआतंकवाद्यांना कुठ्लाच धर्म नसतो वा प्रांतही नसतो हे कालच्या ह्या हल्ल्यातून स्पष्ट झालं आहे.\nमात्र पाक सरकार यातून काही धडा घेतो कि नाही हे तर येणारा काळचं ठरवणार…..\nमात्र माणुसकीला काळिमा फासणारी हि घटना होती.\nपालकांचा मुलीशी ‘सु’संवाद असणे गरजेचे\nभाऊ रायला ओवाळीते ताईची माया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4/%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE.php", "date_download": "2018-08-18T09:04:09Z", "digest": "sha1:YVYOKSMMPPURYELMQCF3GELT6737SZN2", "length": 85170, "nlines": 1233, "source_domain": "tarunbharat.org", "title": "‘आधार’ वापराची उपयोगिता आणि अपरिहार्यता वादातीत | Tarun Bharat", "raw_content": "\nवीर संघवी, ज्येष्ठ पत्रकार\nउजव्या विचारसरणीला एक मंच उपलब्ध होईल म्हणून पुद्दुचेरी साहित्य उत्सव रद्द करण्याची डाव्यांची मागणी विचित्र...\nप्रशांत उमराव, वकील, सर्वोच्च न्यायालय\nमेरठमध्ये हेलिकॉप्टरमधून शिवभक्त कावडियांवर फुलांचा वर्षाव करणारे मेरठ भागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांना...\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळात एकाच दिवशी शंभर बळी\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nआयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ\nअजित वाडेकर यांचे निधन\nकेरळमध्ये पावसाचे ७७ बळी; १८ हजार बेघर\nवीर संघवी, ज्येष्ठ पत्रकार\nAll अर्थ कृषी नागरी न्यायालय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nआयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ\nअजित वाडेकर यांचे निधन\nसीआरपीएफला सर्वाधिक शौर्य पदके\nमहाराष्ट्राला ५१ पोलिस पदके\nहवाई दल जवानाच्या वेषात अतिरेकी\nराजीव गांधींनीच नाकारला होता दलितांचा हक्क\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nरस्ता सुरक्षा विषय अभ्यासक्रमात असावा\nडिजिटल व्यवहारांवर २० टक्के कॅशबॅक\nघर, वाहनकर्ज महागले; व्याजदरात ०.२५ टक्क्यांची वाढ\nमहसूल वाढल्याने जीएसटी घटणार\nनिर्देशांक नव्या विक्रमी उच्चांकावर\n‘डिमांड ड्राफ्ट’च्या नियमात बदल\nडॉलरसमोर रुपया सक्षम, मोदी सरकार धैर्यवान\nदेशभर आज जीएसटी दिवस पाळणार\nआर्थिक सल्लागार भारतीय मूल्ये जोपासणारा असावा\nसरकारी बँकांमध्ये लोकांचा पैसा सुरक्षित\nनागरिकांना प्रामाणिकपणे कर भरण्याची विनंती\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nविदर्भ, मराठवाड्यातील आठ सिंचन प्रकल्पांना केंद्राची मदत\nयंदा ९७ टक्के पाऊस\nहमीभावात दीडपट वाढ होणारच\nशेतीपर्यंत पाणी नेण्याची गरज : नितीन गडकरी\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nआयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ\nअजित वाडेकर यांचे निधन\nसीआरपीएफला सर्वाधिक शौर्य पदके\nमहाराष्ट्राला ५१ पोलिस पदके\nहवाई दल जवानाच्या वेषात अतिरेकी\nराजीव गांधींनीच नाकारला होता दलितांचा हक्क\nरस्ता सुरक्षा विषय अभ्यासक्रमात असावा\nछत्तीसगडचे राज्यपाल बलरामजी दास टंडन यांचे निधन\nउच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र\nआंदोलनात कोट्यवधींची संपत्ती नष्ट होणे भीषणच\nराजीव गांधींच्या मारेकर्‍यांना मुक्त करण्यास केंद्राचा नकार\nबार डान्समध्ये अश्‍लील काय\nनॅशनल हेरॉल्ड प्रकरणी राहुल गांधींना दिलासा नाही\nक्रमांक ३ वरच न्या. जोसेफ यांचा शपथविधी\nजम्मू-काश्मीरच्या कलम ३५-ए वर उद्या सुनावणी\nतीन न्यायमूर्तींची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती\nन्यायाधीशपदी नातेवाईकांच्या नियुक्तीला चाप लागणार\nपीडित बालकांच्या कुठल्याही छायाचित्राला प्रसिद्धी नको\nशबरीमलात महिलांनाही प्रवेशाचा अधिकार\nपंतप्रधान मोदींनी दिल्या इम्रान खान यांना शुभेच्छा\nट्रम्प यांना प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे निमंत्रण\nकाश्मीरची बदनामी करणार्‍या रिपोर्टमागे पाकिस्तानचा हात\nकोरियन द्वीपकल्पातील शांतता प्रक्रियेत भारताचा सहभाग\nभारत घेणार रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली\nसेशेल्समध्ये भारत उभारणार नाविक तळ\nऑगस्टावेस्टलँड : दलालाचे प्रत्यार्पण करण्यास इटलीचा नकार\nराष्ट्रपती तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना\nभारत-ब्रिटनमध्ये होणार प्रत्यार्पण करार\nबांगलादेश परत घेणार आपले ३३ घुसखोर\nइराणवरील बंधनांना भारताचा पाठिंबा नाही\nवाटले नव्हते, ही व्यक्ती पंतप्रधान होईल\nपंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा नाही : शरद पवार\nघुसखोरांचे आदरातिथ्य करायचे का\nएक राष्ट्र, एक निवडणुकीला काँग्रेसचा विरोध\nमोदी सरकारविरुद्ध आंदोलन उभारणार\nअमित शाह महिन्यातून तीन दिवस बंगाल मुक्कामी…\n१७ विरोधी पक्षांना हवी मतपत्रिका\n…तर भारतात रक्ताचे पाट वाहतील\nकाँग्रेसने मान्य केला बोफोर्स घोटाळा\nखटल्याच्या भीतीने राहुल यांचे ते भाषणच काढले\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\nबुलेट ट्रेनसाठी बीईएमएल बनवणार सुटे भाग\n‘बुल’ उधळला: विक्रमी उच्चांकावर विराजमान\nकाँग्रेसच्या भीतीने हादरला होता शेअर बाजार\nभारती एअरटेल, पेमेंट बँकेचा ईकेवायसी परवाना रद्द\nदूरसंचार क्षेत्रात ७५ हजार कर्मचार्‍यांना नारळ\nऐतिहासिक… निर्देशांक ३३ हजारी\nगुंतवणूकदार २५ लाख कोटींनी मालामाल\nरजनीशकुमार स्टेट बँकेचे नवे अध्यक्ष\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nभारतातच तयार होणार सुपर हॉर्नेट\nआयआरएनएसएस-१ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nनेव्हिगेशनल उपग्रहाचे उद्या प्रक्षेपण\n‘जी-सॅट-६ ए’ चे यशस्वी प्रक्षेपण\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nसंरक्षण मंत्रालयाकडून व्यवहार नाही\nसीमेजवळ तैनात होणार चिनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॉकेट\nलष्कराला मिळणार ४०० आधुनिक तोफा\nभीष्म व अजेय रणगाड्यांना स्वदेशी इंजीन\nसीआरपीएफ जवानांना नवे बुलेट प्रूफ जॅकेट\nइसिसचा अतिरेकी अडकला गुप्तचर यंत्रणेच्या जाळ्यात\nसौराष्ट्र सीमेवर पाकची लढाऊ विमाने\nकोणत्याही आव्हानासाठी लष्कर सज्ज\nअग्नी-५ लवकरच लष्कराच्या शस्त्रागारात\nजवानांना १० हजार रुपये कापड भत्ता\nसर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ आला समोर\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nरोहिंग्या निर्वासित नसून, बेकायदेशीर घुसखोरच : किरेन…\n६१,१६४ किमी महामार्गाची कामे सुरू\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान :…\nस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\nनोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन\nपाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात\n२१ हजारांपेक्षा जास्त भारतीयांचे अमेरिकेत अनधिकृत वास्तव्य\nइराणविरोधात अमेरिकेचे एकतर्फी कठोर फेरनिर्बंध\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान :…\nस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\nनिवडणूक नियमाचे उल्लंघन, इम्रान खान यांचा लेखी…\nइम्रान खान यांना खासदारकीची शपथ घ्यायला सशर्त…\n६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू\nअंटार्क्टिकात तुटला अतिविशाल हिमनग\nनोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन\nभारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था\nमल्ल्याची इंग्लंडमधील मालमत्ता जप्त करण्याचे आदेश\nरासायनिक शस्त्रास्त्र वापर बंदीसंबंधित परिषदेला भारताचा पाठिंबा\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nकॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा\nमुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी\nराज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड\nमराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार\nसमृद्धी महामार्गासाठी एकराला ५० लाख रुपये\n‘चाकण पेटवणार्‍या’ पाच हजार जणांवर गुन्हा\nकमी शब्दात व धारदार पोस्ट असावी\nआता घेता येणार वारीचे लाईव्ह दर्शन\nकर्जमाफी कायमस्वरूपी तोडगा नाही : उपराष्ट्रपती\nऔरंगाबादेत पाणीयुद्ध; नळ कापण्यावरून दोन गटात भीषण…\nआता अयोध्येत मंदिर बांधण्यासाठी जाणार\nवंचितांना यमगरवाडी प्रकल्पाने मुख्य प्रवाहात आणले: भैय्याजी…\nनांदेड महानगरपालिकामध्ये कॉंग्रेसची सत्ता\nमुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी\nतुम्ही फक्त चित्रपट दाखवण्याचे काम करा\nसत्ता मिळाली नाही तरी चालेल, पण भाजपा…\nभाजपाने काँग्रेस, राकाँ फोडली असती, म्हणूनच सत्तेत…\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे…\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nगामा पैलवानसह सहा आरोपी अटकेत\nआजपासून फिफा विश्‍वचषकाची जादू\n फुलराणीने दिले २६ वे सुवर्णपदक\nभारताची सुवर्णझळाळी; एकाच दिवशी १७ पदकांची लूट\nतेजस्विनी, अनिश, बजरंगला सुवर्ण\nकुस्तीपटूंना दोन सुवर्णांसह चार पदके\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nशेअर बाजार नव्या शिखरावर\nशेअर बाजाराचा बैल उधळला\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nध्रुपद गायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे निधन\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nतेरा वैभव अमर रहे माँ\nतेरा वैभव अमर रहे माँ\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\n७३ टक्के नागरिकांचा पंतप्रधान मोदींवर विश्‍वास\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\n‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित\nचिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार\nप्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\nअटल, अढळ आणि अमर…\nअटलजी आजचे श्यामाप्रसाद आहेत\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nअटल, अढळ आणि अमर…\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\nअटलजी आजचे श्यामाप्रसाद आहेत\nमेरा परिचय : अटलजींच्या काव्यप्रतिभेतून प्रकटलेले हिंदुसूक्त\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन…\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nराष्ट्रीय एकता दिनानिमित्त ‘एकतेसाठी दौड’\nपरराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज भूतानमध्ये\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची श्री मंजुनाथस्वामी मंदिरात…\nदशम: सौंदर्यलहरी पारायणोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरूत\nनरेंद्र मोदी यांचे नवे मंत्रिमंडळ\nनव्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन्\nश्री गजानन महाराजांची पालखी पंढरपूर वारीहून परतली\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम…\nविधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान\nAll ई-आसमंत ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१२ ऑगस्ट १८ आसमंत\n०५ ऑगस्ट १८ आसमंत\n२९ जुलै १८ आसमंत\n२२ जुलै १८ आसमंत\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१५ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n१४ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n०९ मे १८ सदाफुली\n२७ डिसेंबर १७ सदाफुली\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१५ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१४ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळात एकाच दिवशी शंभर बळी\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…\nवृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…\nजनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nवृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…\nस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\n►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…\n►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…\nकॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा\n►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…\nमुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी\n►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…\nराज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड\n►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…\nतेरा वैभव अमर रहे माँ\n॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…\n॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…\n॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…\n‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित\nअभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…\nचिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार\nऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…\nसंजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…\nसूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49\nHome » आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक » ‘आधार’ वापराची उपयोगिता आणि अपरिहार्यता वादातीत\n‘आधार’ वापराची उपयोगिता आणि अपरिहार्यता वादातीत\n॥ अर्थपूर्ण : यमाजी मालकर |\nभारतासारख्या खंडप्राय देशात आधारकार्डची उपयोगिता लक्षात घेता आता देशाला मागे जाणे अजिबात परवडणारे नाही. आधारचा वापर करून कोणाचे काही नुकसान होत असेल तर मात्र त्यातील त्या त्रुटी कमी केल्या गेल्या पाहिजेत. अर्थात,आधारचे व्यवस्थापन करणार्‍या युआयडीएआयने ती तयारी नेहमीच दर्शविली आहे. पण येथे हेही लक्षात घेतले पाहिजे की अशी काही हानी अजून तरी कोणाची झालेली नाही. तिजोरीत पैसे ठेवले असतील आणि चोराला तिजोरीची किल्ली देऊन चोरी करण्यास कोणी प्रवृत्त केले तर त्यामुळे होणार्‍या नुकसानाला तिजोरीला मालक जबाबदार आहे, तिजोरी नाही, हे जसे खरे आहे, तसेच आधार नंबर, मोबाईल फोन आणि बँक खात्याची पासवर्डसह माहिती दिल्यास कोणी बँकेतून पैसे काढून घेतल्यास आधार कार्ड पद्धतीचा त्यात काही दोष नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे.\n‘टेलिकॉम रेग्युलॅटरी अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया’ म्हणजे ट्रायचे चेअरमन आरएस शर्मा यांनी अलीकडेच एक भारतीय नागरिक म्हणून आपला आधार नंबर सोशल मीडियावर टाकून त्याचा गैरवापर करून दाखवा, असे आव्हान आधारच्या विरोधकांना दिले. ज्यांना आधारला बदनामच करायचे आहे, अशी काही हुशार मंडळी एकत्र आली आणि त्या आधार नंबरच्या आधारे शर्मा यांचा मोबाईल नंबर, घराचा पत्ता, पॅन कार्ड, बँक खाते नंबर शोधून आधार कसे सुरक्षित नाही, असा दावा केला. ज्यांना ऑनलाईन माहिती मिळविणे माहीत आहे, असा माणूस ही माहिती मिळवूच शकतो. तशीया हुशार लोकांनी ही माहिती मिळविली, एवढेच. पण त्यांना युआयडीएआयकडून ही माहिती मिळालेली नाही, हे युआयडीएआयने लगेच स्पष्ट केले. ही माहिती जगजाहीर झाली म्हणून माझे कोणी काही नुकसान करू शकलेला नाही, हे शर्मा यांनी पुन्हा लक्षात आणून दिले आणि आधारचा वापर करून कोणी कोणाचे नुकसान करू शकत नाही, हे पुन्हा लक्षात आणून दिले, हे फार चांगले झाले. हा वाद येथे संपणार नाही, त्याचे पुढे काय होते, हे लवकरच समोर येईल. मात्र आधारला बदनाम करण्यासाठी कशा मोहिमा आयोजित केल्या जात आहेत, हे या निमित्ताने पुन्हा देशासमोर आले आहे.\nवास्तविक कोणत्याही देशात आपण गेलो तर आपली ओळख पटविण्यासाठी विशिष्ट कार्ड हे वापरले जाते, नव्हे ते बंधनकारक आहे. त्याशिवाय त्या देशाचे प्रशासन आणि व्यवस्था कामच करू शकत नाही. १३४ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात असे काही कार्ड नव्हते, ते असावे, असे सरकारला वाटले आणि आधार कार्ड पद्धत शोधून काढण्यात आली. या क्षेत्रातील तज्ज्ञ नंदन निलकेणी यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांच्यासह एका मोठ्या टीमने केलेल्या प्रयत्नांतून आधारचा अविष्कार झाला. बायोमेट्रिक डेटा सोडला तर सोशल मीडियावर जी माहिती आपण सहजपणे देतो, अशीच माहिती आधारला जोडलेली आहे.आणि बायोमेट्रिक डेटा हा कोणालाही मिळू शकत नाही, हे यूआयडीएआयने अनेकदा स्पष्ट केले आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर आधारमुळे येणारी व्यवहारातील पारदर्शकता नको असलेल्या मोजक्या लोकांनी आधार बदनाम करण्याची मोहीम चालविली आहे, असे म्हणण्यास जागा आहे.\nशर्मा यांनी आधारकार्ड नंबर सोशल मीडियावर टाकला हा केवळ आधारच्या विरोधकांना आव्हान देण्यासाठी. पण तसे नागरिकांनी करू नये, असे आवाहन यूआयडीएआयने लगेच केले आहे आणि ते बरोबर आहे. ज्याचा समाजकंटक गैरवापर करू शकतात, ती माहिती स्वत:हून जगजाहीर करण्याचे काही कारण नाही. आता आधारमुळे वैयक्तिक स्वातंत्र्यावर काय गदा येते, याचा लढा सर्वोच्च न्यायालयात सुरू असून त्या निर्णयाची आपण वाट पाहू. स्वातंत्र्याचा संकोच होतो, असे जर न्यायालयाला वाटले तर तसा निकाल न्यायालय देईल आणि त्यानुसार आधारच्या वापरावर मर्यादा आणल्या जातील. पण म्हणून आधारच नको, असे म्हणणे देशाला परवडणारे नाही.\nआधारचे महत्त्व काय आहे आणि त्यामुळे काय काय होऊ शकते, हेही यानिमित्ताने समजून घेतले पाहिजे. गेल्या सात वर्षांत आधार कार्डच्या नोंदणीने मोठी मजल मारली आहे. सध्या १३४ पैकी १२० कोटी भारतीय नागरिकांनी आपले आधार कार्ड काढले असून त्याचा अतिशय चांगला वापर सुरू केला आहे. मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीत नंदन निलकेणी यांच्यासारख्या समर्थ जाणकाराची त्यावर नियुक्ती करण्यात आली. सरकार बदलले आणि नरेंद्र मोदी सरकारने त्यापुढे जाऊन आधारच्या नोंदणीचा वेग तर वाढविलाच पण त्याचा थेट वापर सुरू केला. त्यामुळे बँकेचे केवायसी, मोबाईल कनेक्शन घेण्यासाठीची केवायसी, सामाजिक योजना राबविताना नेमके लाभधारक ओळखणे सोपे झाले. सरकारी मदत आणि सबसिडी थेट बँक खात्यात जमा होऊ लागली. ज्यामुळे या कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारातील मध्यस्थ हटले. यातील लाचारीला लगाम बसला. सामाजिक योजनाच्या वाटपातील तब्बल ९० हजार कोटी रुपयांची गळती रोखण्यास देशाला यश आले. आधारच्या वापरातून आर्थिक आणि इतर व्यवहारांत खूपच पारदर्शकता येऊ शकते, हे लक्षात आल्यावर आधारची व्याप्ती वाढू लागली, हे जे घडले आहे, त्याचे आधी स्वागत केले पाहिजे. कारण जगात दुसर्‍या क्रमांकाची लोकसंख्या असलेला आणि सात टक्के भूभाग व्यापलेला भारत हा समृद्ध देश जेथे अडला आहे, तेथून तो बाहेर पडण्याच्या ज्या काही शक्यता आहेत, त्यात आधारकार्डच्या माध्यमातून देशाचे उत्तम व्यवस्थापन होऊ शकते, हा सर्वात महत्त्वाचा बदल ठरणार आहे.\nव्यक्ती ते व्यक्ती आणि व्यक्ती आणि व्यवस्था यातील विश्‍वासार्ह दुवा म्हणून आधार कार्डचा वापर यापुढे वाढतच जाणार आहे. आधारची नोंदणी, डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी लागणारा खर्च आणि एवढी मोठी योजना देशभर राबविताना काही त्रुटींचा सामना सध्या देश करतो आहे. त्या त्रुटी मोठ्या करून दाखविण्याची आणि या पद्धतीलाच बदनाम करण्याची जी चढाओढ सध्या चालली आहे, ती निश्‍चितच निषेधार्ह आहे. आधारचा डाटा विकला जातो, तो कोणालाही मिळतो, आधार नसल्याने सेवा नाकारल्या जात आहेत, अशा काही घटनांची पुरेशी माहिती न घेता मोठी प्रसिद्धी दिली जाते आहे. हे करताना आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेत आहोत, हे अनेकांना कळेनासे झाले आहे.\nदेशाचे व्यवस्थापन असो किंवा संपत्तीचे न्याय्य वितरण असो, यापैकी काहीही करायचे असो आणि कोणीही करायचे असो, आधारसारख्या व्यापक पद्धतीशिवाय ते शक्य नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. विशेषत: समाजातील आर्थिक विषमता कमी करण्यासाठी देशाचे आर्थिक व्यवस्थापन करण्याशिवाय पर्याय नाही आणि ते करण्यासाठी आधारसारख्या योजनेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आर्थिक विषमतेच्या विरुद्ध लढणार्‍या प्रत्येकाने आधार योजना पुढे कशी जाईल, असे पाहिले पाहिजे.\nआधार कार्डवर नाव, पत्ता, लिंग, जन्मतारीख, वय, फोटो, हाताचे ठसे आणि बुबुळ अशी माहिती असते. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी हे देणे बंधनकारक नाही, कलम ७ नुसार आधार नसणार्‍या कोणालाही जीवनावश्यक सेवा नाकारता येणार नाहीत, वेबसाईटवरून डाऊनलोड केलेले आधार कार्ड आणि मूळ आधार कार्ड यात काहीच फरक नाही, परदेशस्थ भारतीयांना आधार काढण्याची गरज नाही, अशी ही स्पष्टीकरने पुनःपुन्हा करण्यात आली आहेत. पण आपला देश एवढा मोठा आहे आणि सर्व देशभर एखादी योजना राबविण्यात एवढ्या अडचणी आहेत की काही जण त्याचे वेगवेगळे अर्थ काढतात आणि त्यानुसार ती योजना राबविण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे काही काळ अशा योजनांविषयी संभ्रम निर्माण होतात. अर्थात, नागरिकाची ओळख पटविण्यासाठी नेमका कोणता मार्ग अवलंबला जावा, याविषयी १०० टक्के एकमत जगात अजून झालेले नाही. त्यामुळेच ही पद्धत बदलत गेली आहे. तीत तंत्रज्ञानानुसार सुधारणा होत आलेली आहे. आधार कार्डच्या बाबतीतही तेच होते आहे. हाताचे ठसे वापरणे, काहींच्या बाबतीत शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर आता चेहर्‍याचा वापर करून ओळख पटविली जात आहे.याचा अर्थ जसजसे प्रश्‍न लक्षात येत आहेत, तसतशा सुधारणा केल्या जात आहेत. या बदलांकडे सर्वांनीच सकारात्मकदृष्टीने पाहण्याची गरज आहे.\nआपल्याला सतत काही गोष्टी लपविण्याची सवय लागली आहे. आर्थिक व्यवहारातील लपवाछपवी त्यात आघाडीवर आहे. नोटाबंदी, जीएसटी आणि जॅमच्या माध्यमातून बँकेचे खाते, आधार कार्ड आणि मोबाईल फोन जोडण्यासारख्या योजना आम्हाला जाचक वाटतात, याचेही कारण हेच आहे. आधार कार्डविषयी जो अपप्रचार केला जातो आहे, त्याचेही कारण हेच आहे. आधारचे निर्माते नंदन निलकेणी यांनीही आधारविरुद्धच्या प्रचाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे आणि आधार पद्धत कोणत्याही परिस्थितीत पुढेच जाण्याची गरज व्यक्त केली आहे.\nयूआयडीएआयने अलीकडे एक चांगला प्रयोग केला आहे. त्यात आधारविषयी जे जे आक्षेप समोर आले आहेत, त्या सर्वांचे मुद्देसूद स्पष्टीकरण केले आहे. त्यानुसार आधार कार्ड ओळखीशिवाय कोणतीच माहिती जोडून ठेवत नाही, आधार कार्ड नंबरने बँक खात्यातून पैसे काढून घेता येत नाहीत, आधारच्या आधारे आर्थिक फसवणूक झाल्याची एकही घटना अजून घडू शकलेली नाही, बँक खाते आणि आधार कार्ड जोडणे सर्वांच्याच फायद्याचे आहे, त्यामुळे बँकेतून फसवून पैसे काढणे अशक्य होईल, मोबाईलचा गैरवापर टाळण्यासाठी मोबाईल नंबरशी आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे, ज्यामुळे समाजकंटक आणि दहशतवादी त्याचा गैरफायदा घेऊ शकणार नाहीत, बायोमेट्रिक डेटा हा फक्त यूआयडीएआयकडे आहे, तो कोणालाही दिला जात नाही, आधार नसल्यास सबसिडी किंवा मदतीच्या योजना नाकारणे, हा कायद्याने गुन्हा आहे, गेल्या सात वर्षांत आधारच्या संग्रहित डेटाला कोणीही चोरू शकलेले नाही, असे प्रयत्न फोल ठरविण्यात आले असून तो अधिक सुरक्षित राहावा, यासाठीचे प्रयत्न सतत केले जात आहेत, अशा स्पष्टीकरणांचा समावेश आहे. सर्वोच्च संस्थेच्या या स्पष्टीकरणाला निश्‍चितच महत्त्व आहे. •••\nतेरा वैभव अमर रहे माँ\nमाध्यान्ह भोजन ते कोट्यवधींचे साम्राज्य\nन्यायपालिकेतील आणखी एक निरर्थक विवाद\nFiled under : आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक.\nआजपासून फिफा विश्‍वचषकाची जादू\n फुलराणीने दिले २६ वे सुवर्णपदक\nभारताची सुवर्णझळाळी; एकाच दिवशी १७ पदकांची लूट\nतेजस्विनी, अनिश, बजरंगला सुवर्ण\nकुस्तीपटूंना दोन सुवर्णांसह चार पदके\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळात एकाच दिवशी शंभर बळी\nभारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान\nविजयाची चव चाखवणारा कर्णधार\nबंगालचे मोकळे मन काय सांगते\n१८ ऑगस्ट १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑगस्ट १८ मराठवाडा आवृत्ती\n४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nSAMB on मग न्यायाधीशांसाठी तरी का उभे राहायचे\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nमग न्यायाधीशांसाठी तरी का उभे राहायचे\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\n७/१२ प्रभागाचा : सोलापूर महानगरपालिका निवडणूक २०१७\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (150) आंतरराष्ट्रीय (467) अमेरिका (166) आफ्रिका (7) आशिया (259) ऑस्ट्रेलिया (2) युरोप (32) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (1) ई-पेपर (159) ई-आसमंत (59) ई-मराठवाडा (48) ई-सदाफुली (4) ई-सोलापूर (48) कलाभारत (4) किशोर भारत (2) क्रीडा (20) छायादालन (36) ठळक बातम्या (8) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (886) आसमंत (841) मानसी (10) युवा भरारी (9) विविधा (4) सदाफुली (22) फिचर (16) महाराष्ट्र (435) उ.महाराष्ट्र (3) प.महाराष्ट्र (15) मराठवाडा (5) मुंबई-कोकण (87) विदर्भ (11) सोलापूर (17) रा. स्व. संघ (48) राज्य (738) आंध्र (12) ईशान्य भारत (42) उत्तर प्रदेश (100) ओडिशा (3) कर्नाटक (80) केरळ (31) गुजरात (98) गोवा (11) जम्मू-काश्मीर (94) तामिळनाडू (35) दिल्ली (52) पंजाब-हरयाणा (28) बंगाल (31) बिहार-झारखंड (66) मध्य प्रदेश-छत्तीसगड (21) राजस्थान (21) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,864) अर्थ (76) कृषी (25) नागरी (822) न्यायालय-गुन्हे (262) परराष्ट्र (83) राजकीय (261) वाणिज्य (13) विज्ञान-तंत्रज्ञान (35) संरक्षण (143) संसद (126) सांस्कृतिक (18) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (5) संपादकीय (795) अग्रलेख (382) उपलेख (412) साहित्य (11) स्तंभलेखक (1,031) अजय देशपांडे (34) अपर्णा क्षेमकल्याणी (10) अभय गोखले (25) अविनाश कोल्हे (10) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (29) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (45) डॉ.परीक्षित स. शेवडे (30) डॉ.वाय.मोहितकुमार राव (28) डॉ.सच्चिदानंद शेवडे (28) तरुण विजय (9) दत्ता पंचवाघ (10) दीपक कलढोणे (36) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (3) ब्रि. हेमंत महाजन (55) भाऊ तोरसेकर (111) मल्हार कृष्ण गोखले (52) यमाजी मालकर (35) योगानंद काळे (1) रत्नाकर पिळणकर (27) रमेश पतंगे (11) रविंद्र दाणी (57) ल.त्र्यं. जोशी (19) वसंत काणे (18) श्याम परांडे (20) श्याम पेठकर (55) श्यामकांत जहागीरदार (57) श्रीकांत पवनीकर (10) श्रीनिवास वैद्य (48) सतीष भा. मराठे (6) सुधीर पाठक (6) सुनील कुहीकर (52) सोमनाथ देशमाने (34) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (26)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nMore in आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक (12 of 1276 articles)\nमाध्यान्ह भोजन ते कोट्यवधींचे साम्राज्य\n॥ अभिप्राय : डॉ.वाय.मोहितकुमार राव | नानजुंदी यांच्या या यशानं प्रभावित झालेल्या सराफा व्यावसायिकांनी त्याला आपला नेता घोषित केलं आहे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-18T08:44:05Z", "digest": "sha1:WNDYK6Q5YA5LPFM466BUGJEPKBWZHQYO", "length": 6074, "nlines": 79, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "अल्बर्ट श्वाइत्झर - Samirsinh Dattopadhye Ofiicial Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nमहान समाजसेवक अल्बर्ट श्वाइत्झर ( Albert Schweitzer ) यांच्या, ‘प्रार्थना करताना अशी करा की सर्व काही भगवंतावरच अवलंबून आहे आणि परिश्रम करताना असे करा की सर्वकाही तुमच्यावरच अवलंबून आहे’ (Pray as if everything depends on God and work as if everything depends on you) या वाक्याबद्दल सद्गुरु श्री अनिरुद्धांनी त्यांच्या २० नोव्हेंबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.\nअल्बर्ट श्वाइत्झर ( Albert Schweitzer ) या थोर भगवद्‍भक्त असणार्‍या अशा शास्त्रज्ञाची अफाट कामगिरी सुविख्यात आहे. आफ्रिकेतील निबिड अरण्यात अनेक प्रकारची रोगराई आणि अनेक प्रकारची संकटे यांना तोंड देत तेथील गरजू आदिवासींसाठी त्यांनी अहोरात्र निरपेक्ष प्रेमाने काम केले. त्यांच्या परिश्रमाबाबतचा एक किस्सा सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०९ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितला, जो आपण या व्हिडियोत पाहू शकता.\nप्रार्थना आणि परिश्रम (Prayer And Work) महान समाजसेवक अल्बर्ट श्वाइत्झर ( Albert Schweitzer ) यांच्या, ‘प्रार्थना करताना अशी करा की सर्व काही भगवंतावरच अवलंबून आहे आणि परिश्रम करताना असे करा की सर्वकाही तुमच्यावरच अवलंबून आहे’ (Pray as if everything depends on God and work as if everything depends on you) या वाक्याबद्दल सद्गुरु श्री अनिरुद्धांनी त्यांच्या २० नोव्हेंबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥\nईरान मसले पर तनाव बढा\nत्रिविक्रमाची १८ वचने (मराठी)\nत्रिविक्रम के १८ वचन (हिन्दी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2018-08-18T09:08:18Z", "digest": "sha1:UWFUNXLXWM6GWJTLRBUPBOEYF4S7DJSZ", "length": 3231, "nlines": 63, "source_domain": "m4marathi.com", "title": "किचन टीप्स | m4marathi", "raw_content": "\n१.ओल्या नारळाची वाटी शिल्लक राहिली तर टिकण्यासाठी थोडेसे मीठ चोळून ठेवावे.\n२.नारळाचे दूध काढल्यावर चव फेकून न देता त्यामध्ये कांदा आणि डाळीचे पीठ घालून भाजी करावी. अत्यंत रुचकर भाजी होते.\n३.कणिक चाळताना चाळणीत दोन-चार नाणी टाकली तर पीठ लवकर चाळले जाते.\n४.भेंडी चिरताना हाताला थोडेसे तेल लावल्यास भेंडीचा बुळबुळीतपणा हाताला न लागता काम सोपे होते.\n५.पुलावसाठी तांदूळ शिजवताना त्यामध्ये एखादा चमचा साखर घातल्यास शीतं मोकळी होतात.\n६.जायफळ टिकवण्यासाठी रांगोळीमध्ये पुरून ठेवावी. त्यामुळे कीड लागत नाही.\n७.मूग, मटकी, हरभरे वगैरे कडधान्याला भुंगा लागू नये यासाठी थोडीशी बोरिक पावडर लावून ठेवावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/celebrities/santosh-juvekar", "date_download": "2018-08-18T08:18:21Z", "digest": "sha1:D67KVRDYNYD2NGFS5DWDDNUC6CPEV6NI", "length": 2055, "nlines": 45, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Santosh Juvekar | Marathi Dhamaal", "raw_content": "\nउंची: 5 फूट 7 इंच (5'7\")\nजन्म ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र, भारत\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation बघा शनायाने आयुष्यात पहिल्यांदा काय घेतला विकत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/gossips/who-wrote-a-letter-to-amruta", "date_download": "2018-08-18T08:15:16Z", "digest": "sha1:WJURSM3FKIBPODJXHPANQBC22L76X5D2", "length": 7078, "nlines": 58, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Who wrote a letter to Amruta… | Marathi Dhamaal", "raw_content": "\nअमृताला कोणी लिहिल पत्र...\nमराठीतली ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अमृता खानविलकर सध्या बॉलीवूडच्या अनेक चित्रपटातून ती पदार्पण करत आहे.नुकताच अमृता ने ट्विटर वर 100k फॉलोअर झाले म्हणून तिने तिच्या चाहत्यांचे आभार मानले. तसेच ‘डान्स इंडिया डान्स’ च्या ६ व्या पर्वाची अमृता होस्टिंग करत आहे. अमृता सध्या मेघना गुलजार दिग्दर्शित आगामी 'राझी' या चित्रपटा मध्ये काम करत आहे.\nया चित्रपटात आलिया भट सोबत ती काम करत आहे. चित्रपटाची शूटिंग नुकतीच झाली असं अमृता खानविलकर ने तिच्या अनेक मुलाखतीत सांगितले. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आलिया आणि अमृता ची मैत्री अधिक वाढली हे देखील अमृताने आपल्या मुलाखतीत सतत म्हटले आहे. आणि ह्याचा ठोस पुरावा म्हणजे आलियाने अमृताला पाठवलेली एक भेटवस्तू ज्यात आलियाने स्वहस्ताक्षरात एक छोटेसे आभारपत्र आणि काही सुंदर भेटवस्तू अमृताला पाठवल्या.\nअमृता हे पाहून अगदी भारावून गेली, अमृताने सोशल मीडियावर ह्या बाबत पोस्ट केले आहे.\nज्यात ती म्हणतेय, \"आलिया कडून मिळालेली भेट अविस्मरणीय आहे,तसेच तिच्याकडून बरच काही शिकण्यासारखं आहे. तिच्यात असलेले विशेष कौशल्य अगदी कौतुकास्पद आहे.'राझी' हा माझ्यासाठी खूप छान आणि वेगळा अनुभव आहे परंतु तुझी भेटवस्तू अविस्मरणीय आहे और ये करके आपने उसपे मोहर लगा दी .... \"\nबघा अमृताच आलियासाठी लिहिलेलं कॅप्शन...\nतुम्हाला हे वाचायला आवडेल \n‘चला हवा येऊ द्या’ का घेतायेत विश्रांती...\n'गच्ची' वर झाला होता गंभीर अपघात\nहि मराठी अभिनेत्री लवकरच करतेय लग्न...\nबघा शनायाने आयुष्यात पहिल्यांदा काय घेतला विकत\nसुबोध भावे करणार प्राजक्ता माळीसोबत स्क्रिन शेअर\n‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित मराठी चित्रपटाची निर्मिती करणार\n लाफ्टर क्वीन प्राजक्ता हनमघरचे झाले शुभमंगल\nइरफान खान आणि डलक्यूअर सलमान यांच्यासोबत झळकणार मिथिला पालकर\nउर्मिला आणि आदिनाथ ‘आई-बाबा’ होणार\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation अक्षर कोठारी प्रियांका चोप्राच्या आगामी चित्रपटात दिसणार का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.solapurcorporation.gov.in/(X(1)S(piqjp2iuemgbr2im5xf1fm55))/Marathi/Default.aspx?AspxAutoDetectCookieSupport=1", "date_download": "2018-08-18T08:46:35Z", "digest": "sha1:D5D23YK4XHMDXIKFE4JXLSG36KVDZQHG", "length": 5087, "nlines": 69, "source_domain": "www.solapurcorporation.gov.in", "title": "Welcome to Solapur Municipal Corporation, Solapur.", "raw_content": "\nएल. ए ड्रॉविंग माहिती\nमालमत्ता बिल पहा व भरा\nहुतात्मा स्मृती मंदीर ऑनलाइन बुकिंग\nपाणी बिल थकबाकी पहा व भरा\nमहापालिकेसंदर्भातील सर्व बातम्या पहावयास मिळतील.\nमहापालिकेसंदर्भातील वैधाणिक माहिती साठी येथे क्लिक करा.\nया मेनूमधून तक्रार नोंदणी करता येईल. सदर तक्रार नोंदताना कोणत्या खात्याशी संबंधित तक्रार आहे हे माहित नसल्यास कोणत्याही खात्याला तक्रार नोंदवली तरी संबंधित खात्याला पाठविणेची कार्यवाही ठेवली जाईल.आपणांस प्राप्त होणार्‍या टोकन क्रमांकानुसार तक्रारीबाबत माहिती प्राप्त करता येईल.\nमहापालिकेच्या ऑनलाइन सेवा जसे की हुतात्मा हॉल बुकिंग, प्रॉपर्टि टॅक्स चे पेमेंट यांचा या ठिकाणी लाभ घेता येईल.\nमहापालिकेच्या कामकाजासंबंधी प्रसिध्द केलेली पत्रके\nम.न.पा. पदाधिकारी व समित्यांची माहिती\n\"स्वछता हीच सेवा\": एन.जी.ओ / व्हॉलनटीअर नोंदनी\nनागरिकांना करावे लागणारे अर्जाचे नमुने\nम.न.पा.तर्फे दिल्या जाणार्‍या अापत्कालीन सेवा\nसोलापूर महापालिकेचे जाहिरात धोरण\n1) म.न.पा.चे मालकीचे भाड्याने दिलेल्या खुल्या जागांची माहिती\n2) म.न.पा.चे मालकीचे जागांची माहिती\n3) मेजर शॉपिंग सेंटर गाळेधारकांची यादी .\n4) जिल्हा स्टेडियम कमिटी गाळा माहिती.\nप्राप्त व निराकरण झालेल्या तक्रारींची माहिती\nखातेप्रमुखांचे ई-मेल आय डी\nमा नगरसेवकांचे संपर्क नंबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%A9%E0%A5%AF", "date_download": "2018-08-18T09:00:39Z", "digest": "sha1:M5QYVPNCRCKIRQEF433Y7UT4ERASVMNH", "length": 5869, "nlines": 213, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १५३९ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक\nदशके: १५१० चे - १५२० चे - १५३० चे - १५४० चे - १५५० चे\nवर्षे: १५३६ - १५३७ - १५३८ - १५३९ - १५४० - १५४१ - १५४२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nमे ३० - स्पेनचा शोधक व कॉँकिस्तादोर हर्नान्दो दि सोटो ६०० सैनिक घेउन फ्लोरिडात उतरला.\nसप्टेंबर २२ - गुरू नानकदेव, शीख गुरु.\nइ.स.च्या १५३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १६ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० नोव्हेंबर २०१६ रोजी २२:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%97%E0%A4%A1/", "date_download": "2018-08-18T09:07:15Z", "digest": "sha1:ZG6K72BXE36WXBDH3WVK72DWY2OVYHR6", "length": 8975, "nlines": 72, "source_domain": "m4marathi.com", "title": "किल्ले सिंहगड | m4marathi", "raw_content": "\nसिंहगड हा किल्ला पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. स्वारगेट बसस्थानकापासून सारसबाग किंवा नेहरू क्रीडांगणाकडून जाणारा ह्या रस्त्याने सिंहगड अंदाजे ३५ कि.मी.वर आहे.\n*मार्ग : -स्वारगेट – आनंदनगर – वडगांव – खडकवासला – सिंहगड पायथा. स्वारगेट पासून ५० ते ५६ क्रमांकाच्या बस या मार्गावर धावतात. शिवाय, सहा आसनी किंवा खासगी वाहनाने सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. ज्यांना गडावर चालत जायचे नसेल त्यांच्यासाठी पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी खासगी वाहने साधारण दर ३०-६० मिनिटांनी मिळतात.\nहा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो ध्यानी येतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो.\nदारूचे कोठार : दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारू कोठार.\nटिळक बंगला : रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत.\nकोंढाणेश्वर : हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंडी व सांब असणारे हे मंदिर यादवकालीन आहे.\nश्री अमृतेश्वर भैरव मंदिर’ : कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी ह्या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मूर्ती दिसतात. भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे.\nतानाजीचे स्मारक : अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिद्ध तानाजीचे स्मारक दिसते. दरवर्षी माघ नवमीस येथे तानाजीचा स्मृतिदिन साजरा केला जातो.\nदेवटाके : तानाजी स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोटा तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे देवटाके लागते. या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होत असे व आजही होतो.\nकल्याण दरवाजा : गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास ह्या दरवाजातून आपला प्रवेश होतो. हे एकामागोमाग असे दोन दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती.\nउदेभानाचे स्मारक : दरवाजाच्या मागच्या बाजूस वर असलेल्या टेकडीवर यावे. येथे जो चौकोनी दगड आहे तेच उदेभान राठोडचे स्मारकचिन्ह म्हणून ओळखले जाते. उदयभानूच्या स्मारकापुढून समोरची टेकडी उतरून या बुरुजावर येता येते. येथून समोरच टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात तर खाली पानशेतचे खोरे दिसते. पूर्वेकडे लांबवर पुरंदर दिसतो.\nडोणगिरीचा उर्फ तानाजी कडा : झुंजारबुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाटेने तानाजीच्या कडाकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे.येथूनच तानाजी मावळ्यांसह वर चढला.\nराजाराम स्मारक : राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. पेशव्यांतर्फे या स्मारकाची उत्तम व्यवस्था ठेवली जायची.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.manashakti.org/index.php?q=story/%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-08-18T09:13:35Z", "digest": "sha1:2TDRUVCHJ5QKLOYWE3Z2A4IVVN3Y65V5", "length": 7018, "nlines": 95, "source_domain": "www.manashakti.org", "title": "भगवान बुध्दांचा चमत्कार | Manashakti Research Centre", "raw_content": "\nयेथे सातत्यपूर्ण मनःशांती मिळवण्याच्या सोप्या व व्यावहारीक उपायांची माहिती आहे.\nHome » Weekly Story » भगवान बुध्दांचा चमत्कार\nहसणंसुध्दा काटेरी असू शकतं. आपल्याबद्दलच्या उपहासाचं हसणं, आपण स्वत: उपवास करण्यापेक्षा अधिक पीडा देतं.\nपरिसेनाच्याभोवती तुच्छतेच्या तीरांचा मारा होत होता. बिचारा परिसेन तिरस्काराचे तीर घेऊन येणाऱ्या त्या हसऱ्या लाटा सोसत, खाली मान घालून उभा राहिला. म्हातारा, खांदे पुढे आलेला, पाठीला पोक, तोंड उघडं, ओठ थरथरते आणि कपाळाच्या खोबणीत नेहमीचं पाणी साचत राहिलेले डोळे.\nपाचशे भिक्षूंनी तीन वर्ष परिसेनाला शिकवण्यासाठी डोकं फोडलं. पण परिसेनाच्या डोक्यात काही शिरलं नाही. तेव्हा त्या सगळ्या भिक्षूंनी त्याच्यापुढे हात टेकले.\nपरिसेनाला शिकता येत नव्हतं, हे जेवढं खरं, तितकंच त्याच्या पाचशे गुरूंना शिकवता आलं नव्हतं, हेही खरं. दयाविव्हळ भगवान बुध्द पुढे झाले. त्यांनी परिसेनाला एकच पाठ शिकवला.\n“जो विचारांचा, आचारांचा सयंम करता, दुसऱ्याला त्रास देत नाही तो ‘निर्वाण’ मिळवू शकतो. “\nएवढंच. एकच गाथा, एकच सूत्र. वास्तविक परिसेन तेच करत नव्हता का जन्मभर त्यानं कोणाला त्रास दिला नव्हता. परपीडेचा विचारही केला नव्हता. मग उच्चार दूरच. वाईट मनुष्य सुधारला, की त्याच्यामध्ये क्रांती होते, ती ठळकपणाने दिसते. पण सहज स्वभावानं चांगला वागणारा माणूस, जेव्हा तसं वागणं चांगलं असतं हे ऐकतो, तेव्हा आत तो संतुष्ट होतो. परंतु बाह्य क्रांतीची खूण दिसत नाही. कारण तो आधीच चांगला वागत असतो.\nपरिसेनाचं तेच झालं. तो आता स्वयंशांत झाला. त्याला सत्यबोध झाला होता. तो बोधिस्तव झाला होता.\nपण प्रसेनजित राजाच्या दरबारात पहाऱ्यावर उभे असणाऱ्या पहारेकऱ्याला ते कुठे माहिती होतं बुध्द दरबारात पुढे चालत गेला. परंतु मागे भगवान बुध्दाचं भिक्षापात्र हातात घेऊन चालणाऱ्या परिसेनाला, पहारेकऱ्यानं अडवलं.\nराजापाशी भगवान पोचले, तेव्हा राजा उठला. पण विस्फारलेल्या डोळ्यानं म्हणाला, “भगवान आपल्या मागून भिक्षापात्र धरत, एक हात नुसताच हवेत येतो आहे. पाहा एकदा\nभगवानांना मागे पाहण्याची गरज नव्हती. ते म्हणाले, “तो परिसेनाचा हात आहे. त्याला बोधिस्थिती प्राप्त झाली आहे. त्याच्या कर्तव्यात त्याला कुणी अडवूश शकत नाही. “\nराजा चाचरत म्हणाला, “मी ऐकलं होतं, परिसेन ज्ञानहीन आहे. “\n“पण शीलहीन नाही, विचारहीन नाही. तो सहजज्ञानी होता. आता प्रयत्नज्ञानीसुध्दा झाला. दुधात साखर पडली. तो बोधिसत्व झाला. बोधपूर्ण झाला. “\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://punerispeaks.com/ipl-winner-prize-money/", "date_download": "2018-08-18T08:40:52Z", "digest": "sha1:AZEEAJ5G4GUSBEOF45PPO24ICPHIVSNY", "length": 5717, "nlines": 97, "source_domain": "punerispeaks.com", "title": "IPL विजेता टीम ला मिळणार एवढे पैसे, हरणारी टीम सुद्धा होणार करोडपती", "raw_content": "\nIPL विजेता टीम ला मिळणार एवढे पैसे, हरणारी टीम सुद्धा होणार करोडपती\nयंदाचा IPL फायनल चेन्नई सुपर किंग आणि सनरायसर्स हैदराबाद यांच्यादरम्यान होणार असून IPL विजेता संघाला किती पारितोषिक मिळणार हे जाणून घेऊयात.\nविजेत्या संघाला २० कोटी रुपयांचे पारितोषिक आणि ट्रॉफी मिळणार असून उपविजेत्या संघाला १२.५ कोटी रुपये मिळणार आहेत. मागील वर्षी IPL विजेता मुंबई इंडियन्स संघाला १५ कोटी रुपये मिळाले होते.\nसर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला प्रत्येकी १० लाख रुपये पारितोषिक आणि ट्रॉफी मिळणार आहे.\nप्रत्येकवर्षीचा IPL विजेता संघ खालीलप्रमाणे:\nयंदा बाजी कोण मारणार हे बघावे लागेल.\nआपण कोणाला सपोर्ट करत आहात आम्हाला नक्की कळवा…\nअपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.\nपेट्रोल डिझेल च्या किमती भडकणार, ४ ₹ पर्यंत दरवाढ होण्याची शक्यता\nरशीद खान याला नागरिकत्व देण्यासाठी सुषमा स्वराज यांना भारतीयांनी विचारले, त्यांनी दिले उत्तर…\nभाबड प्रेम: मधुरा आणि चंद्रविलास याचं\nPrevious articleइंधन दरवाढीला विरोध करण्यासाठी ब्राझीलच्या ट्रकवाल्यांनी लढवली नामी शक्कल, सरकारची आणीबाणीची घोषणा\nNext articleशेतकरी चोर आणि बेईमान आहेत, त्यांना चपलेने मारलं पाहिजे; भाजप नेते हकम सिंह अनजाना यांचे वादग्रस्त विधान\nAsian Games 2018: आशियाई क्रीडा स्पर्धा वेळापत्रक, प्रक्षेपण, कबड्डी संघ वेळापत्रक\nपिंपरीत प्रियकराने ‘Shivde, I Am Sorry’ चे ३०० फलक लावले, कोण आहे शिवडे\nअटल बिहारी वाजपेयी माहिती, अटल बिहारी वाजपेयी विशेष , अटल बिहारी वाजपेयी मराठी, अटल बिहारी वाजपेयी कविता\nपुणे तिथे काय उणे: देशात राहण्यासाठी पुणे शहर अव्वल स्थानी\nआरक्षण – एक शोधनिबंध | आरक्षण माहिती | आरक्षण म्हणजे काय\nRaj Thackeray VS Ajit Pawar: पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळ्यात एकमेकांवर टीका, वॉटरकप 2018 विजेते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://sanvaad.blogspot.com/2009/02/blog-post_22.html", "date_download": "2018-08-18T08:36:43Z", "digest": "sha1:4HEYQ4JNEPZZKHHIS6VKYYAE6FCNVYFJ", "length": 4178, "nlines": 116, "source_domain": "sanvaad.blogspot.com", "title": "संवाद: चाफा बोलेना...", "raw_content": "\nमाझ्या मनातला सातत्याने चाललेला विचारांचा प्रवास...माझ्यातल्या चाकोरीबाहेरच्या नव्या जाणिवा, नव्या सृजनाची जाण...त्याची अभिव्यक्ति म्हणजेच हा संवाद...मर्मबंधातली ठेव ही\nह्म्म.. लिहिणार होते, त्याशिवाय फोटो टाकायचा नाही असं ठरवलं होतं, कारण मुख्यत्वे ब्लॉग सुरु केला ते काही बाही खरडायला आता ते मागे पडून फोटो टाकणं सुरु झालय आता ते मागे पडून फोटो टाकणं सुरु झालय :P पण, हा एक फोटो मलाच खूप आवडला, आणि इथे पोस्टावासा वाटला म्हणून मग पोस्टतेच. तसाही पेशन्स कमीच आहे माझ्यामधे :P पण, हा एक फोटो मलाच खूप आवडला, आणि इथे पोस्टावासा वाटला म्हणून मग पोस्टतेच. तसाही पेशन्स कमीच आहे माझ्यामधे\nआणि दुसरी सबब अशी की,एक काहीबाही खरडून अर्धवट ठेवलंच आहे आणि ते पोस्टणारच आहे लवकरच. तोपर्यंत एवढी सूट मिळायाला काय हरकत आहे नाही म्हणजे, नसावी, नसूदेत. ... :D\nएक चेहरेपे कईं चेहरे..\nकोलाजचे प्रयोग आणि प्रयत्न\nमाझिया मना जरा सांग ना\nप्रतिबिंब - आणि हा ब्लॉग बघणीय पण :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe.de/ins/in/lp/prj/ptp/ged/de14950456.htm", "date_download": "2018-08-18T08:11:22Z", "digest": "sha1:2F4M234EWTHQHR4RSXHBJUNERJS4UDCJ", "length": 3368, "nlines": 73, "source_domain": "www.goethe.de", "title": "Poets translating Poets - Gedichte - Goethe-Institut", "raw_content": "\nजाणारा जात नाही रिकामा\nजाणाऱ्या माणसाला बरोबर काहीच नेता येत नाही\nखरे नाही त्याचे सारे मागे ठेवणे\nआणि एकट्याने अगदी रिकामे निघून जाणे\nजाताना आपल्या अदृश्य हातांनी\nउचलतो तो कधी आपल्या जिवलगांची नीज\nसहज ओढून नेतो जीवनाचे दिलासे\nविश्वासच कधी हिरावतो कायमकरता\nउगवता उगवता राहून जाते\nत्याच्या श्वासाच्या वाऱ्यावाचून बरेच काही\nकाही ठायीच सुकून जाते\nकधी तो नेतो चोरून संबंधांची अर्थपूर्णता\nआणि थंड वास्तवामधली सृजनाची धुगधुगी\nकधी कधी तर तो बरोबर नेतो\nआणि जन्मांचे शकूनही घेऊन जातो\nजाणाऱ्या माणसाला बरोबर काहीच नेता येत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://swarnim-sakhi.blogspot.com/2011/06/blog-post.html", "date_download": "2018-08-18T08:17:53Z", "digest": "sha1:5SK7LJS3AHIGE67LUAO5KT34D4DMR44N", "length": 12593, "nlines": 157, "source_domain": "swarnim-sakhi.blogspot.com", "title": "Swarnim Sakhi...: मैं...", "raw_content": "\nजब सुबह उठकर अपनी खिड़की खोलकर तुम अंगडाई लेते हो,\nऔर सामने के पेड़ पर महका हुआ फूल हँसके बुलाता है तुम्हे\nतो पता है, उसकी खुशबू में मैं होती हूँ....\nजब मन लगाके काम करते हो.. खो जाते हो बड़ी बड़ी फाईलों मे,\nतो सामने की झरोखे पे बेइंतेहा चहकने वाली चिडिया...\nवो भी मैं ही हूँ...\nजब कभी प्यार से अपने आँगन मे बीज लगाके, सींचते हो बड़ी उम्मीदसे,\nऔर फिर एक दिन अनजान मेहमान बनकर उभर आते है दो पत्ते जमीन से,\nवोह उम्मीद बनकर मैं ही तो रहती हूँ तुम्हारे मन मे..\nजब भीगते हो बारीश की बड़ी बड़ी बूंदों मे बढ़िया से आइसक्रीम लेके,\nवो जो बूंदे गिरती है आइसक्रीम पर, और हो जाती है मीठी मिठीसी,\nउस पिघलती मिठास मे भी तो हूँ मैं ...\nकभी छोटे बच्चे की तरह फ़ेंक देते हो अपनी गुडिया\nऔर फिट ढुंढ्ते हो घर भर बेचैन होके,\nतब रूठकर कोने मे छिपने वाली गुडिया भी मैं ही हूँ...\nजब दुःख आ मिले अनजान मोड़ पर और आसू बहाने के लिए दामन ना मिले किसीका,\nतो जिस तकिये पर सर रखकर रोते हो...\nवो भी तो कोई और नही... मैं ही हूँ....\nइस आसमान से उतरके धरती को चूमने वाले इन्द्रधनुष की तरह...\nऔर ये शब्द पढ़ते पढ़ते मन मे जो खुशी के ख्याल आते है तो वह भी हूँ मैं..\nमैं कोई चेहरा थोडी न हूँ जो दिखायी दे\n.. मैं तो हूँ जीवन जो बहता रहता है\n.. मैं तो हूँ बादल जो बरसता रहता है...\nमैं हूँ वो याद, जो हर दिन नयी कहानी कहती है...\nमैं हूँ वोह बात, जो हर जबानी रहती है...\nक्या यही हूँ मैं,,, या फिर कुछ और भी\nउस मुट्ठीभर रेत की तरह,\nजो हाथ तो आती है.. मगर थोडी थोडी सी ... :)\nLabels: भक्ती, मैं, सखी\nशेवटी ब्लॉग सुरु केलास \nब्लॉगजगतात तुझं हार्दिक स्वागत \nपुढील लिखाणास हार्दिक शुभेच्छा \nअभिनंदन.. शेवटी तू ब्लॉग सुरु केलास :)\nअशीच लिहत रहा. पुलेशु \nबंद दारावाज्याआडून 'ठाक ठाक' वाजावं आणि आपण उत्सुकतेने दार उघडाव... आणि समोर दिसावं तुझ नव रूप... तू थोडीशी आत येता येताच परत जाव ... मनी हुरहूर ठेऊन... आणि परत एका क्षणी वाजावं दार 'ठाक ठाक'... आणि परत नव रूप ... पण तसंच दिलखेचक ...\nहा हा हा ... प्रत्येक कडव असच झुळझुळतय ... आणि माझे डोळे पुढे वाहत चाललेल्या आठवणी बघू की मागून वाहत येणाऱ्या सुंदरता बघू मध्ये नाचणारे.. तू 'जो हाथ तो आती है.. मगर थोडी थोडी सी ...' वाह\n(फक्त तो well, आवडला नाही... उठून दिसतो काट्यासारखा, तिथे 'क्या' कसा वाटेल काय माहित बहुधा टेस्ट चेंज होईल)\nधन्यवाद अन स्वागत ..\n अन इथे सख्य असेल ते जे जे उत्तम उदात्त सुंदर अश्या सारया हृद्य गोष्टींचे .. कविता... लेख... पुस्तक.. फोटो .. रंग ... रेषा... उकार ..वेलांट्या.. जगण्यातल्या चिमुकल्या क्षणांचे .. मनस्वी नात्यांच्या इंद्रधनुषी गोफांचे.. लडीवाळपणे भवती भवती फेर धरणारया आठवणींचे ... अन अंतरी कस्तुरी सारख्या दरवळणारया मैत्रीचे ... किंवा अगदी पायी टोचणारया काट्याचे .. नि पदर ओढत ओरखडे देणाऱ्या निवडुंगाचे सुद्धा .. या सारया गोष्टींचे सख्य आहे.. म्हणून सखी आहे ...\nतुमचे सुद्धा होते का असेच...\nये कैसा सवाल ..\nकाय पाठवू म्हणे ...\nरोज की तरह आ गयी वो... रोज की तरह बच्चा देखता रहा अपनी भूरी आँखे भरके... हाथ उठाये ... दिल भरमाये ... रोज की तरह ... फिर एक बार आस लगा...\nपावसात भिजलेले तन मन माझे उगीचच रुसण्याचे बहाणे हे तुझे क्षणार्धात विरतील दुराव्याचे ढग एकदाच परतुनी माझ्याकडे बघ ... ...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ७\nदिवस सातवा हाही दिवस असाच पहाटे उठतो... आधी गणपतीची रूप डोळ्यात रेखून... मग बाकी काम चालू करतो.. सकाळीच पूजा, आरती करून शेजारया...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग 5\nदिवस पाचवा.. हा दिवस गाजवत येतो तयारी हरतालिकेची अन गणपतीची .. सुरु होतो तोच वाजत गाजत .. पुन्हा एकदा वारी बाजाराची... तयारी हरतालिकेच...\nA Walk In Cloud.... गत वर्षीची कोजागिरी अशी जगजीत सिंगजींच्या गझलेत चिंब भिजलेली होती... \"हाथ छुटे भी तो रिश्ते नाही तोडा करते\" ...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ३\nदिवस तिसरा हा दिवस शुभ्र सकाळचा... किलबिल पक्ष्यांच्या आवाजाने जागा होणारा... शेजारच्या गोठ्यातल्या गाईच्या घुंगुरवाळा आवाजाचा... ...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ४\nदिवस चौथा हा दिवस तसा आरामाचा... सुशेगात उठण्याचा... कामाची घाई विसरून चहा पार्टी करण्याचा.. तळ्याच्या काठावर बसून शांत...\nदिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ६\nदिवस सहावा... अन मग हा उत्सवी दिवस उजाडतो भल्या पहाटेच... मूर्ती स्थानापन्न होते सजवलेल्या माटीच्या मखरात...मागे रंगवलेले चित्र आत...\nपदर ... नक्षीदार पदर ... रेशमी साडीचा...बुट्टीदार काठाचा .. जरतारीच्या मोराचा वयात येताना आपसूकच चापून-चोपून खांद्यावर विसावलेला... सौभ...\nहृद्य वाचकगण - Followers\nकविता (27) तुमचे सुद्धा होते का असेच (14) सखी (10) मैं (9) भक्ती (3) गोकुळ (2) होकार (2) निळा शाम (1) निळाई (1) भूल (1)\nशेअर विथ केअर :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/all-the-expectations-are-on-on-virat-kohali-3/", "date_download": "2018-08-18T07:59:52Z", "digest": "sha1:OX6FJDTH325JR7WJQFNMN5FA45MNUOIN", "length": 10944, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#क्रीडांगण: कोहलीच्या खांद्यावर संघाचे ओझे! (भाग ३) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#क्रीडांगण: कोहलीच्या खांद्यावर संघाचे ओझे\n#क्रीडांगण: कोहलीच्या खांद्यावर संघाचे ओझे\n#क्रीडांगण: कोहलीच्या खांद्यावर संघाचे ओझे\nभारतीय क्रिकेट संघाच्या प्रत्येक परदेश दौऱ्यातील कसोटी मालिका ही अपयशानेच सुरू होते. ही परंपरा इंग्लंड दौऱ्यातही कायम राहिली. पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने उर्वरित मालिकेचा निकाल काय असेल याची कल्पना आपण नक्कीच करू शकतो. कर्णधार विराट कोहली वगळता कोणाच्याच धावा होत नाहीत आणि नेहमीप्रमाणे कोहलीच्या खांद्यावर संघाचे ओझे, अशी परिस्थिती निर्माण होते.\nआता दुसऱ्या कसोटीसाठी संघात काही बदल केले जातील आणि फिरून तेच चित्र पाहायला मिळेल. मुळात एखाद्या दौऱ्यात भारतीय गोलंदाज सातत्याने अपयशी ठरतात हा इतिहास आहे. मात्र, हा दौरा पहिल्याच सामन्यापासून अपवाद ठरला भारतीय गोलंदाजांनी दिशा आणि टप्पा योग्य राखत आणि स्विंगवर कमालीचा ताबा ठेवत इंग्लंडच्या भरवशाच्या फलंदाजांना लवकर बाद करण्यात यश मिळवले, ते देखील दोन्ही डावात. फलंदाजांनी मात्र थोडीदेखील जिगर दाखवली नाही आणि जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि कंपनीसमोर कोहली वगळता सगळ्यांनी नांगी टाकली.\nया कसोटीला सुरुवात होण्यापूर्वी इंग्लंडमध्ये उष्णतेची लाट पसरली होती. त्यामुळे खेळपट्टी पूर्ण कोरडी पडली होती. मात्र लहरी हवामानामुळे सामन्याच्या दोन दिवस आधी ही लाट ओसरली.\nनेहमीप्रमाणे काळे ढग जमा व्हायला लागले आणि खेळपट्टीने रंग बदलला. ही खेळपट्टी आता वेगवान गोलंदाजांना मदत करणार हे उघड होते त्यामुळे भारताने देखील हार्दिक पांड्या धरून चार वेगवान गोलंदाज खेळवले. एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांना संभ्रमात टाकणारा कुलदीप यादव या सामन्यात खेळायला हवा होता. त्याची गोलंदाजी इंग्लंडच्या फलंदाजांना समजतच नव्हती त्यामुळे उमेश यादव आणि महंमद शमी यांच्यापैकी एकाला वगळून कुलदीपला खेळवायला हवे होते मात्र तसे झाले नाही. अर्थात त्याही परिस्थितीत फलंदाजांपैकी कोणीतरी जबाबदारी ओळखून कोहलीला साथ दिली असती तरी सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने लागला असता. पण इतिहासात आणि क्रिकेटमध्ये जर-तरला काही अर्थ नसतो हे पुन्हा एकदा या सामन्याने सिद्ध केले.\nभारताची फलंदाजी आशिया खंडातच बहरते आणि परदेशात नांगी टाकते हे पुन्हा एकदा सिध्द झाले. एकाच सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीही यशस्वी ठरले आहेत आणि भारताने एकहाती सामना जिंकला आहे असे चित्र परदेशात कधीच पाहायला मिळत नाही ही एक शोकांतिकाच आहे. असो. एकाच सामन्यातील पराभवानंतर इतके पोस्टमार्टम खूप झाले. या पराभवातून काही तरी बोध घेत उर्वरित सामन्यात भारतीय खेळाडूंनी सरस खेळ करावा आणि इंग्लंडमध्ये इंग्लंड संघालाच पराभूत करण्याची व मालिका जिंकण्याची किमया साध्य करावी, अशीच तमाम क्रिकेटप्रेमींची अपेक्षा आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराज्य गुणवत्ता यादीत 24 विद्यार्थी\nNext articleकचरा टाकू नका, फलक लावले पण शंभर रुपये दंडाचे झाले काय..\n#विशेष लेख: ऑनलाईनचा झटका (भाग १)\n#स्वातंत्र्यदिन विशेष: तंत्रसमृद्ध देशा… (भाग ३)\nस्वातंत्र्यदिन विशेष: तंत्रसमृद्ध देशा… (भाग १)\n#स्वातंत्र्यदिन विशेष: तंत्रसमृद्ध देशा… (भाग २)\n#विश्लेषण: घुसखोरांना कठोर संदेश (भाग-३)\n#विश्लेषण: घुसखोरांना कठोर संदेश (भाग-२)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.manashakti.org/index.php?q=story/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%97", "date_download": "2018-08-18T09:22:19Z", "digest": "sha1:B3AJ7VZMN6PHF3JDA34BZEFO6AI3YO7Z", "length": 6442, "nlines": 93, "source_domain": "www.manashakti.org", "title": "देवाविरुध्द बंड करणारा राग | Manashakti Research Centre", "raw_content": "\nयेथे सातत्यपूर्ण मनःशांती मिळवण्याच्या सोप्या व व्यावहारीक उपायांची माहिती आहे.\nHome » Weekly Story » देवाविरुध्द बंड करणारा राग\nदेवाविरुध्द बंड करणारा राग\nपाऊस कोसळत होता. पावसाच्या धारातून घोंगावणारा वारा, सळसळते शब्द नाद, वातावरण तीव्र करीत गवाक्षातून घुसत राहिला. विजा चमकत होत्या. कडाडत होत्या. जमीन थरारत होती.\nपंचमहाभूतांनी पृथ्वीवर तांडव चालवले होते. अब्राहम शेकोटीपाशी शांत सुखावला होता.\nअब्राहम हा परम देवभक्त.\nदारावर थाप पडलेली अब्राहमला ऐकू आली. जणु काही प्रथम हळू मारलेले दारावरचे धक्के निरुपयोगी ठरल्यावर, अधिक जोराने किंचित दारावर थाप पडावी, तशी.\nअब्राहम उठला. त्याने दार उघडले. बाहेर पाहिले तर एक ऐंशी वर्षांचा जख्ख म्हातारा. रागवाण्याचे त्राण नसलेला, आणि मुळीसुध्दा हक्क नसलेला. अजिजीच्या स्वरात तो म्हातारा अब्राहमला म्हणाला, “मला आत घ्याल तीन दिवस उपाशी आहे. काकडतो आहे. दया करा.या दुष्ट देवाने माझ्यावर ही पाळी आणली आहे. “\nपहिली वाक्ये ऐकत असतानाच अब्राहमने म्हाताऱ्याला आत आणून आसनावर बसवले होते. वारा येऊ नये म्हणून दार लावून घेतले. निखाऱ्याची शेगडी त्याच्याजवळ ठेवली. व जेवणाचे ताट आणण्याच्या तो तयारीत होता. पण शेवटचे वाक्य ऐकताच अब्राहम पेटून उठला. तो म्हणाला, “देवाबद्दल बोलशील तर याद राख. मी आज वर्षानुवर्षे देवाच्या दर्शनासाठी साधना करतो आहे. “\nम्हाताऱ्याचे ओठ थरथरत होते. अंग लटलटत होते. तो म्हणाला, “तू चांगला आहेस. देव वाईट आहे. त्याने माझे वाटोळे केले. “\n“नीचा, तुझ्या कर्माने तुझे वाटोळे केले. देवाने नव्हे. “अब्राहमने त्या म्हाताऱ्याच्या बखोटीला धरले व दाराबाहेर ढकलून दिले. म्हातारा पुन:पुन्हा विनवत होते. पण अब्राहम त्याचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्याने धाडकन दार लावून घेतल;.\n“अब्राहम-“ धीर गंभीर आवाज मागून आला. ज्या दर्शनाची, ज्या श्रवणाची, वाट पहात होतो, तोच हा देवाचा आवाज, हे अब्राहमने ओळखले. आपल्या कृत्याने देव साहजिकच संतुष्ट झाला, हाच अब्राहमचा अंदाज होता.\nअब्राहम मागे वळला, तेव्हा देवाचा चेहरा त्याला कठोर दिसला. तीव्र स्वरात देव म्हणाला, “अब्राहम, काय केलेस तू हेयाच्या शिव्या ऐकत त्याला मीच जगवले नायाच्या शिव्या ऐकत त्याला मीच जगवले नामग त्याला तू ऐंशी मिनिटेही सांभाळू शकला नाहीसमग त्याला तू ऐंशी मिनिटेही सांभाळू शकला नाहीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-18T08:46:18Z", "digest": "sha1:3V63SWFT5OPHQFD255O3UCRHAMVHIFPS", "length": 28151, "nlines": 141, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "आदिमाता - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\n‘‘त्रिविक्रम ये उस माँ का, उस आदिशक्ती के श्रीविद्यास्वरूप का एकमेव पुत्र है जिस का ब्रेन (Brain) याने मन याने बुद्धी याने मगज़ ये दत्तात्रेय है, जिस का हार्ट (Heart) याने हृदय (अंत:करण) आदिमाता स्वयं है और जिस के कर्मेंद्रिय महाप्राण हनुमानजी है, ऐसा ये त्रिविक्रम है जिस का ब्रेन (Brain) याने मन याने बुद्धी याने मगज़ ये दत्तात्रेय है, जिस का हार्ट (Heart) याने हृदय (अंत:करण) आदिमाता स्वयं है और जिस के कर्मेंद्रिय महाप्राण हनुमानजी है, ऐसा ये त्रिविक्रम है लेकिन ये त्रिविक्रम श्रीश्वासम् में कैसे कार्य करता है लेकिन ये त्रिविक्रम श्रीश्वासम् में कैसे कार्य करता है आज मैं सिर्फ इस विषय पर थोड़ा बोलने वाला हूँ आज मैं सिर्फ इस विषय पर थोड़ा बोलने वाला हूँ क्योंकि समझने के बाद हमें उस का लाभ और भी ज्यादा हो सकता हैं\nइस के लिए पहले हमे जानना चाहिए के जो दत्तात्रेय यानी अवधूत है…दत्तभगवान जिसे कहते है, वो दत्तात्रेय क्या है ये आदिमाता श्रीविद्या क्या है ये आदिमाता श्रीविद्या क्या है इसे श्रीविद्या कहो, महिषासुरमर्दिनी कहो, अनसूया कहो, जगदम्बा कहो, दुर्गा कहो, that does not make any difference.\nइतना तो सीखा होगा की किसी भी चीज में, किसी भी वस्तु में अपनी अपनी खुद की एक क्षमता होती है उसे हम ‘कार्यसामर्थ्य’ कहते है…याने कार्य करने का सामर्थ्य, जिसे हम अंग्रेजी में ‘पोटेंशियल एनर्जी’ (Potential Energy) कहते है उसे हम ‘कार्यसामर्थ्य’ कहते है…याने कार्य करने का सामर्थ्य, जिसे हम अंग्रेजी में ‘पोटेंशियल एनर्जी’ (Potential Energy) कहते है हम सभी के पास जो मूलभूत क्षमता है, कार्यसामर्थ्य है, पोटेंशियल एनर्जी है, वो उसी दत्तात्रेयजी का एक अंश है\nहम पेंडूलम (Pendulum) का उदाहरण लेते है जब हम उसे एक तरफ ले के जाते है, और छोड़ देते है, तो वो अपने आप घुमने लगता है जब हम उसे एक तरफ ले के जाते है, और छोड़ देते है, तो वो अपने आप घुमने लगता है ‘पोटेंशियल एनर्जी’ ‘कायनेटीक एनर्जी’ (Kinetic Energy) बनती है ‘पोटेंशियल एनर्जी’ ‘कायनेटीक एनर्जी’ (Kinetic Energy) बनती है यानी जो स्थिर शक्ती है, वो हलचल करनेवाली शक्ती बन जाती है यानी जो स्थिर शक्ती है, वो हलचल करनेवाली शक्ती बन जाती है उसे कहते है ‘कार्यशक्ती’ उसे कहते है ‘कार्यशक्ती’ ये अम्बा क्या हैं ये अम्बा क्या हैं ये अम्बा है कार्यशक्ती\nये ‘पोटेंशियल एनर्जी’ जो है, क्षमता है, इसे हम लोग ‘कपॅसिटी’ (Capacity) भी कह सकते है अंग्रेजी में अगर हम दत्तात्रेयजी को, यानी पोटेंशियल एनर्जी को कपॅसिटी कहते है, तो ये अम्बा, यानी ये कार्यशक्ती को ‘कॉम्पीटन्सी’ (Competency) कहते है अंग्रेजी में अगर हम दत्तात्रेयजी को, यानी पोटेंशियल एनर्जी को कपॅसिटी कहते है, तो ये अम्बा, यानी ये कार्यशक्ती को ‘कॉम्पीटन्सी’ (Competency) कहते है ये अम्बा का ‘श्रीविद्या’ स्वरूप है, जो ताकद भी देता है, उत्साह भी देता है, और कार्य करवाता भी है, सिखाता भी है ये अम्बा का ‘श्रीविद्या’ स्वरूप है, जो ताकद भी देता है, उत्साह भी देता है, और कार्य करवाता भी है, सिखाता भी है इसीलिए वो श्रीविद्या है…याने विश्व की, विश्व को निर्माण करनेवाली ये कॉम्पीटन्सी है इसीलिए वो श्रीविद्या है…याने विश्व की, विश्व को निर्माण करनेवाली ये कॉम्पीटन्सी है यानी अगर हम में कॉम्पीटन्सी या कार्यशक्ती या उत्साहशक्ती कम है, तो वो कहाँ से आयेगी यानी अगर हम में कॉम्पीटन्सी या कार्यशक्ती या उत्साहशक्ती कम है, तो वो कहाँ से आयेगी उस आदिमाता से आयेगी उस आदिमाता से आयेगी अगर हम में कार्यसामर्थ्य या कार्यक्षमता कम है, तो वो कहाँ से आयेगी अगर हम में कार्यसामर्थ्य या कार्यक्षमता कम है, तो वो कहाँ से आयेगी उस अवधूत से, दत्तात्रेयजी से आयेगी\n‘मैं हूँ’ यह त्रिविक्रम का मूल नाम है – भाग २ (‘ I Am ’ Is Trivikram’s Original Name – Part 2) मानव को स्वयं के बारे में कभी भी नकारात्मक रूप में नहीं सोचना चाहिए भगवान से कुछ मांगते समय भी सकात्मक सोच ही होनी चाहिए भगवान से कुछ मांगते समय भी सकात्मक सोच ही होनी चाहिए ‘भगवान आप मेरे पिता हो और मैं आपका पुत्र हूं ‘भगवान आप मेरे पिता हो और मैं आपका पुत्र हूं आप ऐश्वर्यसंपन्न हो, ऐश्वर्यदाता हो इसलिए मेरे पास भी ऐश्वर्य है, आप उसे\n‘मैं हूँ’ यह त्रिविक्रम का मूल नाम है (‘I Am’ Is Trivikram’s Original Name) आदिमाता चण्डिका और उनके पुत्र त्रिविक्रम (Trivikram) से कुछ मांगते समय श्रद्धावान को सकारात्मक (पॉझिटिव्ह) रूप से मांगना चाहिए वेदों के महावाक्य यही बताते हैं कि हर एक मानव में परमेश्वर का अंश है वेदों के महावाक्य यही बताते हैं कि हर एक मानव में परमेश्वर का अंश है यदि मानव में परमेश्वर का अंश है तो उसे नकारात्मक रूप से मांगने की आवश्यकता ही नहीं है यदि मानव में परमेश्वर का अंश है तो उसे नकारात्मक रूप से मांगने की आवश्यकता ही नहीं है ‘मैं हूँ’ यह त्रिविक्रम\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ- भाग १५ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam – Part 15) लहान मूल ज्याप्रमाणे आपल्या आईवडिलांकडे, आजीआजोबांकडे हट्ट करते, अन्य कुणा तिर्‍हाइकाकडे हट्ट करत नाही; त्याप्रमाणे श्रद्धावानाने आपल्या पित्याकडे म्हणजेच त्रिविक्रमाकडे हट्ट करावा, त्रिविक्रमाच्या मातेकडे म्हणजेच आपल्या आजीकडे अर्थात श्रीमातेकडे हट्ट करावा. त्रिविक्रमच उचित ते सर्वकाही देणारा आहे. या जगात जे जे काही शुभ, कल्याणकारी, मंगल आहे ते निर्माण करणारा ‘जातवेद’ त्रिविक्रम आहे.\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग १४ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam – Part 14) सर्व प्रकारच्या प्रगतीची देवता लक्ष्मीमाता (Laxmi) आहे. ‘हे जातवेदा, लक्ष्मीमातेला माझ्याकडे घेऊन ये’, अशी प्रार्थना ब्रह्मवादिनी लोपामुद्रा श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत करते. मानवाकडे असणारी सर्वांत मोठी क्षमता आहे- प्रार्थना (prayers) करण्याची क्षमता. प्रार्थना म्हणजे प्रेमाने, विश्वासाने भगवंताला साद घालणे, मनोगत सांगणे. श्रद्धावानाने प्रेमाने, विश्वासाने केलेली प्रार्थना भगवंताने ऐकली नाही असे कधी होऊच\nत्रिविक्रम तुमसे प्रेम करते हैं (Trivikram Loves You) श्रद्धावान को दुष्प्रारब्ध से डरना नहीं चाहिए, किसी भी मुसीबत से हार नहीं माननी चाहिए आदिमाता चण्डिका और उनके पुत्र त्रिविक्रम से श्रद्धावान को सहायता अवश्य मिलती है आदिमाता चण्डिका और उनके पुत्र त्रिविक्रम से श्रद्धावान को सहायता अवश्य मिलती है वे श्रद्धावान की हर प्रकार से सहायता करते ही हैं वे श्रद्धावान की हर प्रकार से सहायता करते ही हैं त्रिविक्रम क्यों हमारे लिए इतना करते हैं त्रिविक्रम क्यों हमारे लिए इतना करते हैं क्योंकि वे प्रेममय हैं क्योंकि वे प्रेममय हैं त्रिविक्रम तुमसे निरपेक्ष प्रेम करते हैं, इस बारे में परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग १३ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 13) भारतवासीयांच्या जीवनात सुवर्ण (gold) आणि रौप्य (silver) यांचे स्थान प्राचीन काळापासून अबाधित आहे आणि ऋषिसंस्थेने भारतीय समाजजीवन सुन्दर रित्या घडवले आहे. (Ramayan) रामायणकाळातील ऋषि हे राजसत्तेसमोर लाचार झालेले नाहीत, हे आम्ही पाहतो. या ऋषिसंस्थेने भारतीय समाजास प्रपंच-परमार्थ दोन्ही सुन्दर रित्या करण्यासंबंधी मार्गदर्शन केले. जातवेद हा मूळ ऋषि आहे आणि पुरोहितही. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ- भाग १२ (The Meaning Of The First Rucha Of Shree suktam-Part 12) विविध प्रकारचे सुवर्ण (सोने)(gold) आणि रजत (चांदी)(silver) ‘माझ्या जातवेदा माझ्या श्रीमातेला माझ्यासाठी माझ्या जीवनात, माझ्या क्षेत्रात घेऊन ये’, असे आवाहन जातवेदास म्हणजेच त्रिविक्रमास करण्याबाबत माता लोपामुद्रा श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेद्वारे आम्हाला सांगत आहे. माझ्यासाठी, माझ्या आयुष्यातील प्रश्न सोडवण्यासाठी, संकटाचे रूपान्तर संधीत करण्यासाठी, हित करण्यासाठी जे मूलभूत सामर्थ्य लागते, ते सामर्थ्य सुवर्ण-रजत या मूलभूत तत्त्वांमध्ये आहे.\nश्रीश्वासम्‌ उत्सवाच्या सुखद स्मृति सदैव स्मरणात (Shreeshwasam Utsav Memories)\n४ मे २०१५ ते १० मे २०१५ या कालावधीत आपण श्रीश्वासम्‌ उत्सव आनंदात साजरा केला. या उत्सवादरम्यान अनुभवलेल्या सर्वच अध्यात्मिक कार्यक्रमांची मजा काही औरच होती. या उत्सवातील प्रत्येक गोष्ट मग ती परिक्रमा, पूजन, प्रसाद अर्पण, मुषक (mouse) काढणे, झालीच्या खालून जाऊन दर्शन घेणे, गुह्यसुक्तम्‌ (Guhyasooktam), उषा पुष्करणी वा जलकुंभ असो त्याची स्मृति सदैव आपल्या श्रद्धावानांच्या स्मरणात रहाणारच आहे. या उत्सवानंतर अनेक श्रद्धावानांकडून श्रीश्वासम्‌ उत्सवाचे व्हिडिओ DVDच्या स्वरूपात मिळतील का याबाबत\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ११ (The Meaning Of The First Rucha Of Shreesooktam-Part 11) विविध प्रकारचे सुवर्ण (सोने)(gold) आणि रजत (चांदी)(silver) यांच्यापासून बनलेले अलंकार जिने धारण केलेले आहेत अशा सुवर्णरजतस्रजा श्रीमातेला श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत आवाहन केले आहे. येथे सोने आणि चांदी यांचा उल्लेख केला गेला आहे. सोने आणि चांदी यांचा स्वत:चा वैशिष्ट्यपूर्ण रंग असून त्या रंगांना क्रमश: सोनेरी आणि चंदेरी असे म्हटले जाते व या दोघांचे एकत्र असणे\nश्रीश्वासम् आणि श्वास (The Shreeshwasam And The Breathing) स्थूल दृष्ट्या जरी काही नात्यांमुळे माणसांचे जीवन एकमेकांशी जुळलेले दिसत असले, तरी प्रत्येक जीवात्मा हा स्वतन्त्र आहे आणि प्रत्येकाला स्वत:चा प्रवास, विकास स्वत:च करायचा आहे. श्रीश्वासम् उत्सवामध्ये आपण आपल्या श्वासाचे चारही भाग मूषक (mouse) चित्रित करून मूलाधारचक्राचा अधिष्ठाता असणार्‍या मूलार्कगणेशाच्या चरणी अर्पण केले. या उत्सवात सामील होऊ न शकलेले किंवा यानंतरच्या काळात श्रीश्वास घेऊ इच्छिणारे यांच्यासाठी त्यांच्या त्रिविक्रम आणि आदिमातेवरील विश्वासाद्वारे हे\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग १० (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam – Part 10) जिच्या केवळ उपस्थितीतून तेज प्रकटते अशा हिरण्यवर्णा श्रीमातेला श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत आवाहन केले आहे. जिचा प्रभाव सदैव वाढतच राहतो अशा श्रीमातेच्या उपस्थितीमुळे माझे भलेच होणार आहे, हा श्रद्धावानाचा भाव असतो. लोपामुद्रेने म्हणूनच पहिला शब्द ‘हिरण्यवर्णा’ असा योजला आहे. सर्व रोग, आधिव्याधि, संकटे, पीडा यांचे हरण करणारी, दुष्प्रारब्धाचे हरण करणार्‍या आदिमाता चण्डिकेला\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ९ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 9) जातवेद अग्निला हिरण्यवर्णा श्रीमातेला घेऊन येण्याचे आवाहन केले आहे. श्रीमाता सुवर्णाची कांती असणारी आहे. व्यक्तीच्या दिसण्यातून, वागण्यातून जे तेज प्रकट होते, त्याला कांती असे म्हणतात. जिच्या केवळ उपस्थितीतून तेज प्रकटते अशा श्रीमातेला हिरण्यवर्णा म्हटले आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ८ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 8) सुवर्णाची कांती असणारी या शब्दात श्रीमातेचे म्हणजेच आदिमाता चण्डिकेचे वर्णन श्रीसूक्तात केले आहे. सुवर्णाचे महत्त्व भारतवासीय प्राचीन काळापासून जाणतात. अनुनाकीय असोत की अन्य आक्रमक असोत, सुवर्ण हस्तगत करण्यासाठी हल्ले झाले आहेत. ज्ञानरूपी सुवर्ण आणि खरे सुवर्ण भारताकडे होते. हिरण्यवर्णा आदिमातेचा वर्ण सुवर्णवर्ण आहे असे श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत म्हटले आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल\nसद्‌गुरू श्रीअनिरुद्ध बापूके श्रीश्वासम्‌ प्रवचन का हिन्दी अनुवाद (Shreeshwasam)\nहरि ॐ, श्रीराम, अंबज्ञ पहले हमें अब श्रीसूक्त सुनना है पहले हमें अब श्रीसूक्त सुनना है श्रीसूक्त… वेदों का यह एक अनोखा वरदान है जो इस… हमने उपनिषद् और मातृवात्सल्यविंदानम् में पढ़ा है कि लोपामुद्रा के कारण हमें प्राप्त हुआ है…महालक्ष्मी और उसकी कन्या लक्ष्मी… इस माँ-बेटी का एकसाथ रहनेवाला पूजन, अर्चन, स्तोत्र, स्तवन… सब कुछ… यानी यह ‘श्रीसूक्तम्’ श्रीसूक्त… वेदों का यह एक अनोखा वरदान है जो इस… हमने उपनिषद् और मातृवात्सल्यविंदानम् में पढ़ा है कि लोपामुद्रा के कारण हमें प्राप्त हुआ है…महालक्ष्मी और उसकी कन्या लक्ष्मी… इस माँ-बेटी का एकसाथ रहनेवाला पूजन, अर्चन, स्तोत्र, स्तवन… सब कुछ… यानी यह ‘श्रीसूक्तम्’ तो आज पहले… स़िर्फ आज से हमें शुरुआत करनी है तो आज पहले… स़िर्फ आज से हमें शुरुआत करनी है ‘श्रीसूक्तम्’ का पाठ हमारे महाधर्मवर्मन् करनेवाले हैं\nईरान मसले पर तनाव बढा\nत्रिविक्रमाची १८ वचने (मराठी)\nत्रिविक्रम के १८ वचन (हिन्दी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/saha-upayani-prem-vyakt-karun-navryala-ashchrychakeet", "date_download": "2018-08-18T08:16:14Z", "digest": "sha1:VFV4E5PUEWGOK7KNB3GU2IQGVOVC37S4", "length": 12352, "nlines": 224, "source_domain": "www.tinystep.in", "title": "६ उपायांनी प्रेम व्यक्त करून नवऱ्याला आश्चर्यचकीत करा - Tinystep", "raw_content": "\n६ उपायांनी प्रेम व्यक्त करून नवऱ्याला आश्चर्यचकीत करा\nया जगात तुम्ही सर्व काही विकत घेऊ शकता, पण प्रेम कधीच कुठेच विकत घेता येत नाही. प्रेम व्यक्त करण्यासाठी पैसा लागत नसतो, काही वेळा छोट्या- छोट्या गोष्टींनी व्यक्त केलेले प्रेम, हृदयाला भिडून तुमचे नाते घट्ट करते. ह्या छोट्या कृती तुमच्या नवऱ्याबाबत करू शकता. त्यावरून ते तुमच्या प्रेमाला समजून घेतील.\nतुम्ही विचार करत असला की, हीच कल्पना प्रथमच का घेतली ह्यामुळे तुमचे स्वयंपाक करण्याचे कौशल्य पतीला समजून येईल आणि चांगली पदार्थ बनवून खाऊ घालणे किती महत्वाचे आहे. व त्यामुळे तुम्हाला किती आनंद मिळतो हे त्यांना कळेल.\n२) प्रेम व्यक्त करा\nतुम्ही शेवटच्या वेळी कधी तुमचे प्रेम व्यक्त केले आणि ते कोणत्या पद्धतीने. कारण पुन्हा त्या गोष्टींनी तुम्ही तुमच्या प्रेमाला व्यक्त करू शकता. प्रेम व्यक्त करायला साध्या गोष्टीनेही व्यक्त करता येते फक्त ते व्यक्त करा. त्यासाठी लाज बाळगू नका.\n३) काहीही न सांगता सहलीचे नियोजन करा\nदररोजच्या दैनंदिन रुटीन मधून बदल गरजेचा असतो. आणि जर एखादी व्यक्ती जॉबवर असेल आणि नेहमी आपल्या कामात व्यस्त असते. त्यांनी जरूर याचा विचार करून सहलीचे नियोजन करा. अशा एकांत ठिकाणी जाऊन तुम्हाला बाळाविषयीचे स्वप्न, भविष्यातील प्लॅन व तुमच्या जुन्या आठवणी याबाबत संवाद करता येईल, आणि सोबत खूप गप्पा मारता येतील. या सहलीमुळे तुम्हाला उत्साहित व टवटवीत वाटेल.\n४) जुन्या आठवणींचा अल्बम\nजर तुम्ही सोशल मीडियाचा वापर करत नसाल, पण तुम्हाला तुमच्या साथीच्या जीवनात आनंद भरायचा असेल तर सोशल माध्यमांचा वापर करून घ्या. फेसबुक वर तुमची जुनी फोटो टाका. व रात्री एकांत असताना एकदम टी. व्ही वर तुमच्या फोटोचा अल्बम चालू करा. ती जुनी फोटो बघितल्यावर तुम्ही दोघे शांत होऊन जुन्या आठवणी किती छान होत्या आणि आता आपण कसे आहोत, यावर तुमचे विचारमंथन सुरु होईल. आणि तुम्ही दोघे पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडाल.\n५) सर्जनशील भेट द्या\nगिफ्ट देण्यासाठी खूप पैसे खर्च करू नका. काहीतरी नावीन्यपूर्वक विचार करून एखादी भेट द्या. मग त्यात जर जोडीदार वेळेवर येत नसेल तर घड्याळ भेट देणे. एखाद्या अंध मुलांच्या, कर्णबधिर, किंवा अनाथ मुलांच्या शाळेत जाऊन भेट देण्याच्या प्लॅन करा. याही गोष्टीमुळे जोडीदाराच्या मनात तुमच्या बाबतीत आदराची जागा होईल.\n६) जोडीदाराचे मनातले ओळखा\nएखादा दिवस, असा विचार करण्यासाठी द्या की, माझ्या जोडीदाराला काय आवडत असेल. त्याचे आवडते जेवण कोणते त्याला टी. व्ही वर कोणता शो पाहायला आवडतो त्याला टी. व्ही वर कोणता शो पाहायला आवडतो त्याला कोणत्या गोष्टीने हसू येईल त्याला कोणत्या गोष्टीने हसू येईल याची यादी करून ती पूर्ण करायचे ठरावा. यामध्ये तुम्हाला आनंदही वाटेल. व नवीनच काहीतरी रचना सुद्धा होईल. आणि या कल्पना प्रत्यक्ष आल्यावर जोडीदाराला खूप आश्चर्य वाटेल. जमल्यास स्वतः प्रयोग करून बघा. समोरची व्यक्तीच्या या कृतीने डोळ्यात आनंदाश्रू उभे राहतील.\nएखादा दिवस अप्रत्यक्षपणे तुमच्या जोडीदाराची जी घराकडची माणसं असतील त्यांना बोलावून जेवणाची पार्टी द्या. त्याच्या जवळच्या लोकांना बोलावून घ्या. अशाच नवीन कल्पनांनी तुमचे आयुष्य समृद्ध क\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213508.60/wet/CC-MAIN-20180818075745-20180818095745-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://manashakti.org/index.php?q=mr/content/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE", "date_download": "2018-08-18T10:08:34Z", "digest": "sha1:OLRG4SE2B5MDTNNLXHAJSUJVZLPWPKKZ", "length": 7599, "nlines": 159, "source_domain": "manashakti.org", "title": "युवकांसाठीचे उपक्रम | Manashakti Research Centre", "raw_content": "\nयेथे सातत्यपूर्ण मनःशांती मिळवण्याच्या सोप्या व व्यावहारीक उपायांची माहिती आहे.\nबुद्धिनिष्ठ प्रार्थनेचा, गर्भावर आणि मातेवर होणारा परिणाम\nHome » युवकांसाठीचे उपक्रम\nयौवनाचा काळ म्हणजे खळाळणारा उत्साह; ध्येयाबद्दलची स्वप्नं; आव्हानं झेलण्याची उमेद; उधाणलेलं तरीही तरल, हळवं, संवेदनशील झालेलं मन आर्इ-वडिलांपेक्षा मित्र-मैत्रिणींची साथसंगत, मौजमजा हवीहवीशी वाटत राहाते आर्इ-वडिलांपेक्षा मित्र-मैत्रिणींची साथसंगत, मौजमजा हवीहवीशी वाटत राहाते भविष्याच्या रंगीबेरंगी, अनेक पदरी मोहक वाटांच्या चौरस्त्यावर आयुष्य उभे असते भविष्याच्या रंगीबेरंगी, अनेक पदरी मोहक वाटांच्या चौरस्त्यावर आयुष्य उभे असते अशावेळी समर्थ, सुजाण मागर्दशर्न मिळाले, तर आयुष्यात क्रांति होऊ शकते अशावेळी समर्थ, सुजाण मागर्दशर्न मिळाले, तर आयुष्यात क्रांति होऊ शकते त्यासाठी, मनशक्ती केंद्राचे, विज्ञानाच्या भक्कम पायावर आधारलेले पुढील उपक्रम, साहित्य आणि उत्पादने आहेत.\nन्यूरो कॉग्निटिव्ह टेस्ट (Language-\n‘आवड – परिणाम’ किंवा ‘कल’ चाचणी(Language-\n‘ब्रेन – डॉमिनन्स’ चाचणी(Language-\nयौवनाच्या क्रांतीदिशा - कुटुंबसुखवर्धन(Language-मराठी)\nवंशज क्रांती (वय १५ ते २१ वर्षे)(Language-मराठी)\nविधायक ३१ डिसेंबर (Language-मराठी)\nच्यवनप्राशावलेह - (500 gms)\nशतावरी कल्प (२५० ग्रॅम)\n१० वी, १२ नंतर काय\nनवविवाहित जोडपी आणि गर्भधारणेपूर्वी\nगर्भसंस्कार (जन्मपूर्व शिक्षण-संस्कार प्रयोग)\nआध्यात्मिक विकास (योग, ध्यान, मंत्र, यज्ञ, पुजा, प्रार्थना, धर्म, देव)\n`स्वानंद' आयुर्वेदीय औषध उत्पादने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television", "date_download": "2018-08-18T10:37:09Z", "digest": "sha1:NVYBMGLT5KPUA64LNRHNSYQBHZZYTXMA", "length": 7941, "nlines": 216, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Television - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'अमेय वाघ' करणार 'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स' चं सूत्रसंचालन\nमनमुराद हसणे हे आपल्या आयुष्यात नेहमीच फायदेशीर ठरते. आजच्या या धकाधकीच्या जीवनातून काहीवेळ सर्व ताण तणाव विसरून आपल्याला काही मनोरंजनाचे क्षण देण्यासाठी आणि आपल्या चेहऱ्यावर एक निखळ हास्य उमटवण्यासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील विनोदी सिनेमे आणि नाटक अतिशय महत्वाची भूमिका निभावतात. त्यात काम करणारे हास्यकलाकार यांना मिळणारा मान प्रसिद्धी ही इतर आघाडीच्या अभिनेत्यांच्या तुलनेत फारच कमी असते. मराठी रंगभूमी आणि सिनेमाशी निगडित पुरस्कार सोहळ्यात सुद्धा विनोदी नाटक आणि सिनेमांना योग्य ते महत्व मिळत नाही . त्यामुळेच विनोदी शैलीला त्याचे एक व्यासपीठ देण्यासाठी आणि मराठी विनोदाला एक वेगळा दर्जा देण्यासाठी, झी टॉकिजने अतिशय अभिमानाने 'झी कॉमेडी अवॉर्ड्स' हा हास्याचा उत्सव साजरा करायला प्रारंभ केला. झी टॉकीज वर, झी कॉमेडी अवॉर्ड्स २०१८ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या वर्षी याकार्यक्रमाचे हे ५ वे वर्ष असून झी टॉकिज कॉमेडी अॅवॉर्डस अजून दिमाखदार होणार आहेत.\n\"अंजली स्वीकारणार सईचं आव्हान\" - पहा 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेचा २ तासांचा विशेष भाग १९ ऑगस्टला\nSony Pictures Network चे मराठी मनोरंजन क्षेत्रातले पहिले पाऊल - Sony मराठी\n'नवरा असावा तर असा - बिग बॉस मराठी स्पेशल' भाग १९ ऑगस्टला\n'फुलपाखरू' मधील वैदेहीच्या \"मंगळसूत्रा\" ची सर्वत्र चर्चा\nया आठवड्यातील 'संगीत सम्राट पर्व २' मधील पाहुणा कलाकार आहे आदर्शसाठी खास\nनिरागस सुरांना मिळणार नवी ओळख - \"सूर नवा ध्यास नवा - छोटे सूरवीर\" कलर्स मराठीवर \n१२ ऑगस्टला स्टार प्रवाहवर पाहा ‘हॉस्टेल डेज’ चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर\nपडद्यामागच्या कलाकारांचा जेव्हा सन्मान होतो -‘छोटी मालकीण’ मालिकेचे निर्मिती प्रमुख 'दादा गोडकर' यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\nतीच धम्माल मस्ती घेऊन पुन्हा येतोय 'बॉईज 2' ५ ऑक्टोबरपासून\n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेमधील हरहुन्नरी लक्ष्मी म्हणजेच अभिनेत्री 'समृद्धी केळकर' झाली \"कथ्थक विशारद\"\n'अमेय वाघ' करणार 'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स' चं सूत्रसंचालन\n\"अंजली स्वीकारणार सईचं आव्हान\" - पहा 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेचा २ तासांचा विशेष भाग १९ ऑगस्टला\nSony Pictures Network चे मराठी मनोरंजन क्षेत्रातले पहिले पाऊल - Sony मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.tarunbharat.com/news/598367", "date_download": "2018-08-18T10:26:00Z", "digest": "sha1:DYV7X7RFVCZ3IGKSBR7DDCJIPNS76Y6A", "length": 10514, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शिक्षणाच्या ज्योतीने प्रज्वलित झाले २५० विद्यार्थ्यांचे आयुष्य - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » विशेष वृत्त » शिक्षणाच्या ज्योतीने प्रज्वलित झाले २५० विद्यार्थ्यांचे आयुष्य\nशिक्षणाच्या ज्योतीने प्रज्वलित झाले २५० विद्यार्थ्यांचे आयुष्य\nऑनलाईन टीम / पुणे :\nकधी अतिवृष्टी तर कधी गारपीट अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यातच शेतक-यांचे संपूर्ण आयुष्य निघून जाते. निसर्गाच्या कोपामुळे कंटाळून शेतकरी आत्महत्या करतो. विदर्भ मराठवाडयातील शेकडो गावांमध्ये आजही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अशा आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबातील किमान मुलांनी तरी शिक्षण घेऊन मोठे व्हावे, यासाठी पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेने पुढाकार घेतला आहे. मागील सहा वर्षांपासून संस्थेतर्फे बीडमधील दुष्काळग्रस्त शिरुर कासारमधील अशा मुलांचे शैक्षणिक पालकत्त्व घेण्यात येते. यंदा तब्बल २५० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्त्व स्वीकारुन त्यांचे आयुष्य शिक्षणाच्या ज्योतीने प्रकाशमान केले आहे.\nनिरंजन सेवाभावी संस्थेतर्फे बीड शिरुर कासार येथे झालेल्या कार्यक्रमात शेतक-यांच्या २५० मुलांचे शैक्षणिक पालकत्त्व स्वीकारण्याचा कार्यक्रम पार पडला. उपक्रमाला कासट सिक्युरिटी प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक राजेश कासट, ब्रिंटॉन फार्माचे संचालक राहुल दर्डा, अहमदनगर येथील उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी मोठया प्रमाणात सहकार्य केले आहे. विद्यार्थ्यांना दप्तर, वही, पेन, पेन्सिल यांसह शाळेचा गणवेश, बूट आदी वर्षभर लागणारे सर्व साहित्य संस्थेतर्फे देण्यात आले.\nराजेश कासट म्हणाले, आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबातील मुलांना अनेकदा आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे पुरेसे शिक्षण घेणे शक्य होत नाही. या मुलांनी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. त्यांच्यासाठी शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी संस्थेने सुरु केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे.\nराहुल दर्डा म्हणाले, ग्रामीण भागात अनेकदा शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना आपण पाहतो. अशा मुलांना शिक्षणासाठी आवश्यक गोष्टी दिल्यास नक्कीच त्यांचे भविष्य उज्वल होईल. तसेच इतरांनी देखील आपल्या समाजात कोणी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करायला हवे.\nपालकत्त्व योजनेतील शिवकन्या मिसाळ ही विद्यार्थीनी म्हणाली, माझ्या वडिलांचा मृत्यु झाल्यामुळे माझी आईवर कुटुंबाची जबाबदारी आली. त्यामुळे खूप ताण पडत होता. परंतु संस्थेने राबविलेल्या या उपक्रमाचा माझ्यासारख्या मुला-मुलींना नक्कीच फायदा होणार आहे. शिक्षणासाठी आवश्यक सगळ्या गोष्टी संस्थेने उपलब्ध करून दिल्याने आम्हाला आमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी बळ मिळाले आहे. यातून आम्ही खूप शिकून मोठे होऊ, उच्च पदावर जाऊ असा विश्वास आहे.\nबीडसह मुळशीतील नांदगाव, रायगड आणि अहमदनगरमध्ये देखील पालकत्त्व योजना\nकेवळ पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहणाºया या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारी सर्व मदत संस्थेमार्फत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सुरुवातीला २५ विद्यार्थ्यांच्या पालकत्वापासून प्रारंभ करण्यात आलेल्या या उपक्रमाची व्याप्ती वाढत आहे. दोन वर्षांपूर्वी १५४ शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व संस्थेने घेतले होते. त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील २०० गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले. तर, मागील वर्षी २२२ मुलांचे पालकत्त्व संस्थेने स्वीकारले होते. यावर्षी २५० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. बीडसह मुळशी नांदगाव, रायगड आणि अहमदनगरमध्ये देखील हे कार्य अव्याहतपणे सुरु आहे.\nअंधत्त्वावर मात करत कृतिका बनली डॉक्टर\nमहाराष्ट्रातील धरणात किती पाणीसाठा \nमुंबई आयआयटीतील विद्यर्थ्यांना मायक्रोसॉफ्ट,गूगलकडून कोटय़ावधींच्या ऑफर्स\nरामनवमी उत्सवात साईंचरणी सव्वा चार कोटींचे दान\nPosted in: विशेष वृत्त\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.beblia.com/pages/main.aspx?Language=Marathi&Book=24&Chapter=47", "date_download": "2018-08-18T10:07:48Z", "digest": "sha1:KDANQO2ECDHTKXFHIXCSHHO46ENLAVAW", "length": 14534, "nlines": 78, "source_domain": "www.beblia.com", "title": "यिर्मया ४७ - पवित्र बायबल [Marathi Bible 1826]", "raw_content": "पोलिश १९७५ पोलिश १९१०\nसर्बियन १८६५ सर्बियन लॅटिन १८६५\nबल्गेरियन १९४० बल्गेरियन १९१४\nझेक २००९ झेक Ekumenicky चेक १६१३ चेक १९९८\nअझरबैजान १८७८ अझरबैजान दक्षिण\nस्लोव्हेनियन २००८ स्लोव्हेनियन १८८२\nलाटवियन LJD लाट्वियन Gluck\nहंगेरियन १९७५ हंगेरियन Karoli १५८९\nफिनिश १९३३ फिन्निश १७७६ फिन्निश १९९२\nनार्वेजियन १९३० नॉर्वेजियन १९२१\nस्वीडिश Folk १९९८ स्वीडिश १९१७ स्वीडिश १८७३\nग्रीक १७७० ग्रीक GNT १९०४ ग्रीक आधुनिक १९०४ ग्रीक १९९४\nजर्मन १९५१ जर्मन एल्बर १९०५ जर्मन ल्यूथर १९१२ जर्मन १५४५\nडच १६३७ डच १९३९ डच २००७\nडॅनिश १९३१ डॅनिश १८१९\nफ्रेंच १९१० फ्रेंच डार्बी फ्रेंच जेरुसलेम फ्रेंच व्हिगोरेक्स बास्क\nइटालियन CEI १९७१ इटालियन La Nuova Diodati इटालियन Riveduta\nस्पॅनिश १९८९ स्पॅनिश १९०९ स्पॅनिश १५६९\nपोर्तुगीज १९९३ पोर्तुगीज आल्मेडा १६२८ पोर्तुगीज आल्मेडा १७५३ पोर्तुगीज CAP पोर्तुगीज VFL\nपापुआ न्यू गिनी १९९७ पपुआ न्यू गिनी टोक पिसिन\nतुर्की HADI २०१७ तुर्कीश १९८९\nहिंदी HHBD हिंदी २०१० गुजराती कन्नड मल्याळम मराठी ऑडिआ तामिळ तेलगू\nनेपाळी १९१४ नेपाळी तमांग २०११\nफिलीपिन्स १९०५ सिबूआनो टागालॉग\nख्मेर १९५४ ख्मेर २०१२\nआफ्रिकान्स झॉसा झुलु सोथो\nअम्हारिक १९६२ अम्हारिक DAWRO अम्हारिक GOFA अम्हारिक GAMO अम्हारिक तिग्रीन्या वोलयटा\nबंगाली २००१ बंगाली २०१७\nउर्दू २००० उर्दू २०१७ पंजाबी\nअरेबिक NAV अरेबिक SVD\nफारसी १८९५ फारसी डारी २००७\nइंडोनेशियन १९७४ इंडोनेशियन BIS इंडोनेशियन TL इंडोनेशियन VMD\nव्हिएतनामी ERV २०११ व्हिएतनामी NVB २००२ व्हिएतनामी १९२६\nचीनी सरलीकृत १९१९ पारंपारिक चीनी १९१९ चीनी सरलीकृत नवीन २००५ चीनी पारंपारिक नवीन २००५ चीनी पारंपारिक ERV २००६\nजपानी १९५४ जपानी १९६५\nकोरियन १९६१ कोरियन KLB कोरियन TKV कोरियन AEB\nइंग्रजी ESV इंग्रजी NASB इंग्रजी NIV इंग्रजी NLT इंग्रजी Amplified इंग्रजी डार्बी इंग्रजी ASV इंग्रजी NKJ इंग्रजी KJ\nअॅरेमिक लॅटिन ४०५ एस्पेरांतो कॉप्टिक कॉप्टिक साहिदीक\nरशियन सिनोडल बेलारूसी युक्रेनियन पोलिश १९७५ पोलिश १९१० सर्बियन १८६५ सर्बियन लॅटिन १८६५ बल्गेरियन १९४० बल्गेरियन १९१४ स्लोव्हाकियन झेक २००९ झेक Ekumenicky चेक १६१३ चेक १९९८ रोमानियन अझरबैजान १८७८ अझरबैजान दक्षिण अर्मेनियन अल्बेनियन स्लोव्हेनियन २००८ स्लोव्हेनियन १८८२ क्रोएशियन एस्टोनियन लाटवियन LJD लाट्वियन Gluck लिथुआनियन हंगेरियन १९७५ हंगेरियन Karoli १५८९ फिनिश १९३३ फिन्निश १७७६ फिन्निश १९९२ नार्वेजियन १९३० नॉर्वेजियन १९२१ स्वीडिश १९१७ स्वीडिश १८७३ स्वीडिश Folk आइसलँडिक ग्रीक १७७० ग्रीक GNT १९०४ ग्रीक आधुनिक १९०४ ग्रीक १९९४ हिब्रू जर्मन १९५१ जर्मन १५४५ जर्मन एल्बर १९०५ जर्मन ल्यूथर १९१२ डच १६३७ डच १९३९ डच २००७ डॅनिश १९३१ डॅनिश १८१९ वेल्श फ्रेंच १९१० फ्रेंच डार्बी फ्रेंच जेरुसलेम फ्रेंच व्हिगोरेक्स बास्क इटालियन १९७१ इटालियन La Nuova Diodati इटालियन Riveduta स्पॅनिश १९०९ स्पॅनिश १५६९ स्पॅनिश १९८९ जमैकन पोर्तुगीज १९९३ पोर्तुगीज आल्मेडा १६२८ पोर्तुगीज आल्मेडा १७३ पोर्तुगीज CAP पोर्तुगीज VFL नहुआटल Kiche किक्की क्वेचुआन न्युझीलँड मलेशियन पापुआ न्यू गिनी १९९७ पपुआ न्यू गिनी टोक पिसिन तुर्कीश १९८९ तुर्की HADI हिंदी HHBD हिंदी ERV २०१० गुजराती कन्नड मल्याळम मराठी ऑडिआ तामिळ तेलगू बर्मा नेपाळी १९१४ नेपाळी तमांग फिलीपिन्स सिबूआनो टागालॉग कंबोडियन १९५४ ख्मेर २०१२ कझाकस्तान थाई आफ्रिकान्स झॉसा झुलु सोथो अम्हारिक १९६२ अम्हारिक DAWRO अम्हारिक GOFA अम्हारिक GAMO अम्हारिक तिग्रीन्या वोलयटा नायजेरियन दिंका अल्जेरियन ईव स्वाहिली मोरोक्को सोमालियन शोना मादागास्कर रोमानी गॅम्बिया कुर्दिश हैतीयन बंगाली २००१ बंगाली २०१७ उर्दू २००० उर्दू २०१७ पंजाबी अरेबिक NAV अरेबिक SVD फारसी १८९५ फारसी डारी २००७ इंडोनेशियन १९७४ इंडोनेशियन BIS इंडोनेशियन TL इंडोनेशियन VMD व्हिएतनामी १९२६ व्हिएतनामी ERV व्हिएतनामी NVB चीनी सरलीकृत १९१९ पारंपारिक चीनी १९१९ चीनी सरलीकृत नवीन २००५ चीनी पारंपारिक नवीन २००५ चीनी पारंपारिक ERV २००६ जपानी १९५४ जपानी १९६५ कोरियन १९६१ कोरियन AEB कोरियन KLB कोरियन TKV इंग्रजी ESV इंग्रजी NASB इंग्रजी NIV इंग्रजी NLT इंग्रजी Amplified इंग्रजी डार्बी इंग्रजी ASV इंग्रजी NKJ इंग्रजी KJ अॅरेमिक लॅटिन एस्पेरांतो कॉप्टिक कॉप्टिक साहिदीक\nउत्पत्ति निर्गम लेवीय नंबर अनुवाद यहोशवा न्यायाधीश रूथ 1 शमुवेल 2 शमुवेल 1 राजे 2 राजे 1 इतिहास 2 इतिहास एज्रा नहेम्या एस्तेर जॉब स्तोत्र नीतिसूत्रे उपदेशक सॉलोमनचे गाणे यशया यिर्मया विलाप यहेज्केल डॅनियल होशे जोएल आमोस ओबद्या योना मीखा नहूम हबक्कूक सपन्या हाग्गय जखऱ्या मलाखी\nमॅथ्यू मार्क लूक जॉन कायदे रोमन्स 1 करिंथकर 2 करिंथकर गलतीकर इफिसियन्स फिलिपीन्स कलस्सियन 1 थेस्सलनीकाकर 2 थेस्सलनीकाकर 1 तीमथ्य 2 तीमथ्य टायटस फिलेमोन इब्री जेम्स 1 पीटर 2 पीटर 1 योहान 2 योहान 3 योहान जुदाई प्रकटीकरण\n१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७ ४८ ४९ ५० ५१ ५२\n४७:१ ४७:२ ४७:३ ४७:४ ४७:५ ४७:६ ४७:७\nयिर्मया या सदेष्ट्याला परमेश्वराकडून पुढील संदेश आला. तो पालिष्ट्यांबाबत होता. फारोने गज्जा शहरावर हल्ला करण्यापूर्वी हा संदेश आला.\n उत्तरेला शत्रू-सैनिक एकत्र आले आहेत वेगाने वाहून काठावर पसरणाऱ्या नदीप्रमाणे ते येतील. पूर ज्याप्रमाणे जमीन व्यापतो, तसेच ते सर्व देशांत पसरतील शहरे आणि त्यातील रहिवासी यांना ते गिळतील. त्या देशात राहणारा प्रत्येकजण मदतीसाठी आक्रोश करील.\n“त्यांना घोड्याच्या टापांचे आवाज ऐकू येईल रथांचा गडगडाट व चाकांचा खडखडाट त्यांना ऐकू येईल. वडील आपल्या मुलांचे रक्षण करु शकणार नाहीत. ते इतके दुबळे होतील की ते मदत करु शकणार नाहीत.\nसर्व पलिष्ट्यांच्या नाशाची वेळ आली आहे. सोर आणि सीदोन यांच्या उरलेल्या साहाय्यकांच्या नाशाची वेळ आली आहे. लवकरच परमेश्वर पलिष्ट्यांचा नाश करील. कपतोर द्विपातील वाचलेल्यांचाही तो नाश करील.\nगज्जाचे लोक दु:खी होतील आणि आपले मुंडन करतील. अष्कलोनचे लोक शांत होतील. दरीतील वाचलेल्या लोकांनो तुम्ही कीती काळ स्वत:ला जखमा करणार\n“परमेश्वराच्या तलवारी, तू अजून थांबली नाहीस किती काळ तू लढत राहणार किती काळ तू लढत राहणार परत आपल्या म्यानात जा. थाब परत आपल्या म्यानात जा. थाब\nपण परमेश्वराची तलवार विश्रांती कशी घेऊ शकेल परमेश्वराने तिला आज्ञा दिली की अष्कलोन व समुद्रकिनारा ह्यावर हल्ला कर.”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://shatadapremkarave.blogspot.com/2008/07/blog-post_3922.html", "date_download": "2018-08-18T10:49:01Z", "digest": "sha1:MA4GRHUE32YWB6HXFKD7BEI2NMI2BEL6", "length": 2713, "nlines": 66, "source_domain": "shatadapremkarave.blogspot.com", "title": "शतदा प्रेम करावे: द्वंद्व....", "raw_content": "\nनमस्कार मित्रानो. मी अनिल बिहाणी . मझ्याबाबातीत सांगण्यासारखे विशेष काहिच नाहि.मी एक् सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य मुलगा आहे.पण प्रत्येक समान्यात कुठे तरि असामन्यत्व द्डलेलं असतं.माझ्यातल्या या असामान्यत्वाचा शोध् घेणे सद्या सुरु आहे.\nमागे मी ओढला जातो\nपप्पा पप्पा करत अलगद\nगोड बोबडे बोल ऐकुनी\nपोट आणि ह्रदयाचे हे\nद्वंद्व असे नेहमी घडते\nद्वंद्वात मात्र नेहमीच या\nका कसे पण पोटच जिंकते.\nजय हो तेरी गोविंदा ......\nही वाट दूर जाते .......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-all-country-water-supply-miraj-railway-57939", "date_download": "2018-08-18T10:39:55Z", "digest": "sha1:BV7OH65OBBRQFJWXFK2JLT3GUNKRZHOV", "length": 13941, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur news all country water supply in miraj railway मिरजहून रेल्वेने करू शकतो देशभरात पाणीपुरवठा - शेखर गायकवाड | eSakal", "raw_content": "\nमिरजहून रेल्वेने करू शकतो देशभरात पाणीपुरवठा - शेखर गायकवाड\nशुक्रवार, 7 जुलै 2017\nसोलापूर - भारतात यापूर्वी राजस्थानमध्ये सर्वप्रथम रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला होता. ते अंतर 130 किलोमीटरचे होते आणि आठवड्यातून तीन वेळा हा पाणीपुरवठा होत होता. गतवर्षीच्या दुष्काळात मिरजहून लातूरला 450 किलोमीटर अंतरावरून पाणीपुरवठा करण्यात आला. या पाणीपुरवठ्यासाठी केलेली यंत्रणा आजही तत्पर आहे. देशातील कोणत्याही भागात पाणीटंचाई भासली, तर मिरजहून रेल्वेने सहज पाणीपुरवठा करण्याची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती सांगलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी व भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड यांनी दिली.\nसोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर गायकवाड यांनी आज \"सकाळ'च्या सोलापूर कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. रेल्वेने पाणीपुरवठा केलेला हा प्रयोग आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुकाचा विषय झाला होता. रेल्वेच्या टॅंकरमध्ये पाणी भरण्यासाठी 13 इंचाचे पाइप आवश्‍यक होते. जळगाव येथील जैन पाइप्सला अशा पद्धतीचे पाइप बनविण्यास सांगण्यात आले. त्यांनीही रात्रभर कारखाना सुरू ठेवून 48 तासांमध्ये हे पाइप्स उपलब्ध करून दिले. मिरज रेल्वे स्थानकावरील इतर गाड्यांचे वेळापत्रक पाहून लातूरला जाणाऱ्या रेल्वेत पाणी भरले जात होते. तब्बल साडेचार महिने 26 कोटी लिटर पाणी मिरजहून लातूरला पोचविण्यात आले. रेल्वेने पाणीपुरवठा करण्यासाठी त्या काळात निर्माण केलेली यंत्रणा आजही उपयुक्त असून, भविष्यात देशात कोठेही मिरजहून रेल्वेने पाणीपुरवठा करता येणे शक्‍य होणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.\nएकीकडे मिरजहून रेल्वेने लातूरला पाणीपुरवठा होत असताना दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ योजनेसाठी तेथील शेतकऱ्यांनी आठ कोटी रुपये भरून पाणी विकत घेतले होते. मिरजहून लातूरला झालेल्या पाणीपुरवठ्याबद्दल अनेक चांगल्या प्रतिक्रिया आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. मिरजमधील एका मुस्लिम व्यक्तीच्या मुलीच्या विवाहाची बोलणी लातूरमधील एका मुलासोबत सुरू होती. मिरजच्या व्यक्तीची आर्थिक स्थिती बिकट असल्याने लातूरवाल्यांनी होकार दिला नव्हता. मिरजवाल्यांनी लातूरला फुकट पाणी दिल्याने मिरजकरांचा दिलदारपणा पाहून लातूरच्या त्या व्यक्तीने मिरजचे स्थळ कबूल केल्याची घटनाही या रेल्वेने पाणीपुरवठा केल्यामुळे घडली असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.\nसिद्धूचे पाक लष्करप्रमुखांना अलिंगन\nनवी दिल्ली : पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला काँग्रेसचे नेते व भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांना खास आमंत्रण होते....\nKerala Floods : केरळमध्ये मदतीसाठी 38 हेलिकॉप्टर, शेकडो बोटी\nकोची : केरळमध्ये यंदाच्या शतकातील सर्वांत मोठी पूर आला असून, पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी तब्बल 38 हेलिकॉप्टर आणि शेकडो बोटी कार्यरत आहेत...\nपिंपरी - दोन मुलांना मारून वडिलांची आत्महत्या\nपिंपरी (पुणे) - दोन मुलांना मारून वडिलांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना शनिवारी दुपारी ताथवडे येथे घडली. शुभम बर्मन (वय १०) रूपम वर्मा (वय...\nMaratha Kranti Morcha : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री आंदोलन\nपुणे : मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे सोमवारपासून (ता.20) मराठा आरक्षणासाठी आणि विविध मागण्यांसाठी पुणे विभागीय आयुक्त...\n'एक धागा शौर्य' का सैनिकांसाठी जुन्नरच्या विद्यार्थ्यांनीचा अभिनव उपक्रम\nजुन्नर - सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांसाठी जुन्नरच्या शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थिनींनी 'एक धागा शौर्य'का हा अभिनव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/sohrabuddin-fake-encounter-case-bombay-high-court-1631419/", "date_download": "2018-08-18T11:08:49Z", "digest": "sha1:ENPHTJ77KCK6Z66BPBWRDNGMEAFYR5DY", "length": 14137, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sohrabuddin Fake Encounter Case bombay high court | सोहराबुद्दीन खटल्यात न्यायाशीच प्रतारणा | Loksatta", "raw_content": "\nबेशिस्त वाहनचालकांना ९१ लाखांचा दंड\nपक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा\nपुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित\nजळगावमध्ये महाजन-खडसे गटबाजीची सर्वत्र बाधा\nएमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल\nसोहराबुद्दीन खटल्यात न्यायाशीच प्रतारणा\nसोहराबुद्दीन खटल्यात न्यायाशीच प्रतारणा\nया प्रकरणातील आरोपींना वेगवेगळा न्याय लावला जात आहे.\nमुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ठिपसे यांचे परखड मत\nसोहराबुद्दीन शेख चकमक खटल्यात अनेक अनियमितता आहेत. या खटल्याची हाताळणी ज्या प्रकारे केली जात आहे आणि अनेक बडय़ा आरोपींना मुक्त केले जात आहे त्यावरून संशयाला जागा आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने स्वत: होऊन कृती करून या खटल्याच्या फेरविचाराची मागणी केली पाहिजे, असे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभय ठिपसे यांनी म्हटले. या अनियमिततांमुळे न्यायाशीच प्रतारणा सुरू आहे, असे परखड मत त्यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत मांडले.\nया प्रकरणातील आरोपींना वेगवेगळा न्याय लावला जात आहे. कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना आरोपांतून मुक्त केलेले नाही. पण अनेक बडय़ा पोलिस अधिकाऱ्यांना दोषमुक्त केले जात आहे. वास्तविक सर्व आरोपींना एकच न्याय किंवा युक्तिवाद लागू होणे आवश्यक आहे. पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना दोषमुक्त केलेले नाही. मात्र गुजरात पोलिसांचे तत्कालीन डीआयजी वंझारा, राजस्थान पोलिसांचे अधीक्षक दिनेश एम. एन. गुजरात पोलिसांचे अधीक्षक राजकुमार पांडियन आदींना वेगळा न्याय लावला गेला आहे. यातून कुठेतरी पाणी मुरत असल्याचे जाणवते, असे ठिपसे म्हणाले.\nआरोपींना जामीन मंजूर करण्याच्या पद्धतीतही संशयास वाव आहे. मुंबईतील सीबीआय न्यायालयात सुनावणी होत असलेल्या प्रकरणात ३८ आरोपींना मुक्त केले आहे. त्यात भाजप अध्यक्ष अमित शहा, राजस्थानचे माजी गृहमंत्री गुलाबचंद कटारिया, वंझारा, पांडियन यांचा समावेश आहे. या प्रकरणातील ३० साक्षीदारांनी नोव्हेंबर २०१७ पासून त्यांची साक्ष फिरवली आहे, असे त्यांनी सांगितले.\nया प्रकरणात ठिपसे वंझारा यांना जामीन देण्यास तयार नव्हते. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांचे सहआरोपी राजकुमार, पांडियन आणि बी. आर. चौबे यांना जामीन मिळाल्याने वंझारा यांनाही जामीन द्यावा लागला. मात्र त्यावेळी आपण वंझारा यांच्या विरोधात सकृतदर्शनी पुरावा असल्याचे म्हटले होते, असेही ठिपसे यांनी सांगितले.\nया प्रकरणाची सुनावणी करणारे दिवंगत न्यायमूर्ती लोया यांच्या पूर्वी न्या. जे. टी उत्पात सुनावणी करत होते. त्यांची अचानक आणि लवकर बदली झाली.\nतेथेही संशयाला वाव असल्याचे ठिपसे म्हणाले. त्याचबरोबर या सुनावणीत इतके गुप्त काय आहे, असा प्रश्नही त्यांनी सीबीआय खटल्याच्या मागील एका निर्णयाबाबत उपस्थित केला. साधारणपणे खुली सुनावणी केली असता पारदर्शी कारभार होतो आणि आरोपीला सुरक्षित वाटते. त्यामुळे गुप्त सुनावणी घेण्यात हाय हशील आहे हे समजत नाही, असे ठिपसे म्हणाले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nइम्रान खानच्या शपथविधीला सिद्धूंना मानाचे स्थान, घेतली लष्करप्रमुखांची गळाभेट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसहजीवनाचा पहिला टप्पा सर, थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा\n पिंपरीत पित्याने दोन मुलांची हत्या करुन केली आत्महत्या\nIt's Official: नात्यावर शिक्कामोर्तब करत अखेर निक-प्रियांका म्हणाले....\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nअंतर्गत वाहतुकीसाठी ट्रामचा पर्याय\nवाहनांना एक टोल माफ\nरेल्वेचे संगणकीय आरक्षण केंद्र पावणेतीन तास बंद राहणार\nस्वानंद देणारे शिक्षण निवडा\nवामनदादा कर्डकांना शाहिरीतून अभिवादन\nभूगावमधील हॉटेलमध्ये कोंबडय़ांच्या झुंजीवर जुगार\nपाणी पुरेना आणि म्हणे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/clean-campaign-nmmc-1628846/", "date_download": "2018-08-18T11:13:28Z", "digest": "sha1:KA5B6ZIK7WTCYVRI645PIJ6S7R6B3QXW", "length": 18728, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "clean campaign NMMC | स्वच्छ अभियानाचे मान्यवरांकडून कौतुक | Loksatta", "raw_content": "\nबेशिस्त वाहनचालकांना ९१ लाखांचा दंड\nपक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा\nपुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित\nजळगावमध्ये महाजन-खडसे गटबाजीची सर्वत्र बाधा\nएमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल\nस्वच्छ अभियानाचे मान्यवरांकडून कौतुक\nस्वच्छ अभियानाचे मान्यवरांकडून कौतुक\nपालिकेच्या या प्रयत्नांचे केंद्रीय तसेच राज्य स्तरावरील उच्च अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.\nकेंद्रीय समितीकडून सर्वेक्षणाला गुरुवारपासून सुरुवात\nगेल्या वर्षी स्वच्छतेत देशात आठवा आणि राज्यात पहिला क्रमांक पटकाविलेल्या नवी मुंबई पालिकेने देशात पहिला क्रमांक मिळविण्यासाठी कंबर कसली असून स्वच्छतेचे सर्व निकष पूर्ण करण्याचा सपाटा लावला आहे. पालिकेच्या या प्रयत्नांचे केंद्रीय तसेच राज्य स्तरावरील उच्च अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. गेली अनेक दिवस सर्वेक्षणाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नवी मुंबई पालिका प्रशासनाने गुरुवारी सुटकेचा नि:श्वास सोडला असून केंद्रीय पाहणी पथक शहरात डेरेदाखल झाले आहे. दोन-तीन दिवस हे पथक शहरातील स्वच्छतेची अचानक पाहणी करून गुणांकन देणार आहे. यात लोकसहभागाला जास्त महत्त्व आहे.\nजानेवारीपासून स्वच्छ सर्वेक्षण समितीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नवी मुंबई पालिका प्रशासनाने गुरुवारी अखेर सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. गेल्या वर्षी औरंगाबाद येथे समितीच्या सदस्यांना पटविण्यासाठी लक्ष्मी दर्शनाचा लाभ देण्यात आल्याने यंदा केंद्रीय मंत्रालयाकडून निर्देश दिल्यानंतरच हे पथक त्या विभागाची पाहणी करणार आहे. गुरुवारी या पथकाने पालिकेचे कागदोपत्री गृहपाठाची तपासणी केली. शुक्रवारपासून हे पथक शहरातील कोणत्याही भागाची अचानक पाहणी करणार आहे.\nप्रारंभी ग्रामीण व शहरी भागातील स्वच्छतेबाबत उदासीन असलेल्या पालिकेने लांबणीवर पडणाऱ्या सर्वेक्षणाची फायदा घेऊन चांगल्या उपाययोजना केल्याची चर्चा आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पहाटे पाच वाजल्यापासून स्वच्छतेचे धडे गिरवण्यास लावले जात आहेत. त्यामुळे स्वच्छता एके स्वच्छता हाच मंत्र जपला जात होता. गेल्या वर्षी माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कडक शिस्तीत पालिकेने स्वच्छता अभियान राबविले होते, मात्र यात ग्रामीण व झोपडपट्टी भागाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते होते. विद्यमान आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी कोणताही गाजावाजा न करता केलेल्या स्वच्छता उपाययोजना वाखणण्याजोग्या असल्याची चर्चा शहरात आहे. झोपडपट्टी भागातील शौचालयाची स्वत: पाहणी करणारे आयुक्त सातत्याने शहरभर भेटी देत असल्याने अक्षरश: आजारी पडले आहेत. अनेक मान्यवर आणि नवी मुंबईकर असलेल्या सनदी अधिकाऱ्यांनी पालिकेच्या या उपाययोजनांचे तर कौतुक केलेच, पण सर्वसामान्य नागरिकदेखील या चकाचक येलो सिटीमुळे सुखावून गेला आहे.\nऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी हे शहर सुशिक्षितांचे शहर आहे, मात्र त्यांचा आतापर्यंत सहभाग दिसून येत नव्हता. आज डॉक्टर, वकील, अभियंता या अभियानात सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहर स्वच्छतेची जबाबदारी असलेले सर्व घटकांनी स्वच्छतेचा वसा घेतला आहे, असे सांगितले. हे सातत्य टिकवण्याची सर्वाची जबाबदारी असून यंदा आपण देशात पहिला क्रमांक पटकावू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nबेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी शहरातील ग्रामीण व झोपडपट्टी भागातील अस्वच्छतेबाबत यापूर्वी मी टीका केली होती, मात्र त्यानंतर पालिकेने केलेल्या उपाययोजना चांगल्या असून शहराने एक रंग धारण केल्याचे दृश्य आहे, या शब्दांत शहर स्वच्छतेचे कौतूक केले. ठाणे बेलापूर मार्गावरून प्रवास करताना परदेशात प्रवास करीत असल्याची जाणीव होते. ही स्वच्छता कायम राहावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.\nशहराचे रुपडे बदललेले दिसत आहे. या सर्व अभियानात नागरिकांचा सहभागही तेवढाच दिसून येत आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेले स्वच्छ संदेश, पथनाटय़, ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण, विशेषत: रामनगर, दिघा या झोपडपट्टी भागातील स्वच्छता कौतुकास्पद आहे.\n– व्ही. के. जिंदाल, केंद्रीय सचिव, स्वच्छ भारत अभियान\nसाफसफाई कामगारांचे फलकांद्वारे करण्यात आलेले अभिनंदन वेगळी कल्पना वाटली. ऐरोली येथील माईण्ड स्पेस आयटी कंपनीत तयार करण्यात आलेले ओला व सुका कचऱ्यापासून खतनिर्मिती हे प्रकल्प उद्योजकही या उपक्रमात सामील झाल्याचे उदाहरण आहे.\n– मनीषा म्हैसकर, प्रधान सचिव, नगरविकास विभाग, राज्य\nप्रत्येक उद्यानात ओला आणि सुका कचऱ्यापासून निर्माण होणारे खत त्याच उद्यानात वापरण्याची कल्पना अतिशय कल्पक असून आतापर्यंत भेट दिलेल्या सोलापूर, औरंगाबाद आणि पनवेल पालिकांपेक्षा येथील स्वच्छता आणि कल्पकता सुंदर आहे.\n– अनिल कदम, आमदार, अध्यक्ष, अर्थसंकल्पीय अंदाज समिती, राज्य\nराज्य पातळीवर काम केल्याने विविध शहरांना भेटी दिलेल्या आहेत, पण नवी मुंबई पालिकेने स्वच्छतेबाबत केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. त्यामुळे निवृत्तीनंतर मिळणारे एक महिन्याचे मानधन हे शहर साफ करण्यासाठी कामगार व विभाग अधिकाऱ्यांना समर्पित केले आहे.\n– सुब्बाराव पाटील, माजी सचिव, राज्य महिला आयोग\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n पिंपरीत पित्याने दोन मुलांची हत्या करुन केली आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nIt's Official: नात्यावर शिक्कामोर्तब करत अखेर निक-प्रियांका म्हणाले....\nसहजीवनाचा पहिला टप्पा सर, थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा\nइम्रान खानच्या शपथविधीला सिद्धूंना मानाचे स्थान, घेतली लष्करप्रमुखांची गळाभेट\nमिनी एसयुव्हीसारखं डिझाईन असलेली नवीन रेनाँ क्विड वसूल करते तुमचा पै न पै\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nअंतर्गत वाहतुकीसाठी ट्रामचा पर्याय\nवाहनांना एक टोल माफ\nरेल्वेचे संगणकीय आरक्षण केंद्र पावणेतीन तास बंद राहणार\nस्वानंद देणारे शिक्षण निवडा\nवामनदादा कर्डकांना शाहिरीतून अभिवादन\nभूगावमधील हॉटेलमध्ये कोंबडय़ांच्या झुंजीवर जुगार\nपाणी पुरेना आणि म्हणे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-powershot-ixus-140-point-shoot-digital-camera-red-price-pNkmh.html", "date_download": "2018-08-18T10:07:53Z", "digest": "sha1:QXSN5GAJKPOE66NVFKRYGEOD5QGFWGBN", "length": 19474, "nlines": 469, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन पॉवरशॉट इक्सस 140 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन पॉवरशॉट इक्सस 140 पॉईंट & शूट\nकॅनन पॉवरशॉट इक्सस 140 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\nकॅनन पॉवरशॉट इक्सस 140 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन पॉवरशॉट इक्सस 140 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\nकॅनन पॉवरशॉट इक्सस 140 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये कॅनन पॉवरशॉट इक्सस 140 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड किंमत ## आहे.\nकॅनन पॉवरशॉट इक्सस 140 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड नवीनतम किंमत Aug 09, 2018वर प्राप्त होते\nकॅनन पॉवरशॉट इक्सस 140 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेडफ्लिपकार्ट, होमेशोप१८ उपलब्ध आहे.\nकॅनन पॉवरशॉट इक्सस 140 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 12,120)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन पॉवरशॉट इक्सस 140 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन पॉवरशॉट इक्सस 140 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन पॉवरशॉट इक्सस 140 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 6 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन पॉवरशॉट इक्सस 140 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन पॉवरशॉट इक्सस 140 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड वैशिष्ट्य\nमॉडेल नाव IXUS 140\nअपेरतुरे रंगे F3.3 - F6.9\nकाँटिनूपूस शॉट्स Yes, 0.8 fps\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\nशटर स्पीड रंगे 1/2000 sec\nसेन्सर सिझे 1/2.3 inch\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 1 sec\nपिसातुरे अँगल 28 mm Wide-angle\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 460,000 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 4:3, 16:9, 1:1, 3:2\nविडिओ फॉरमॅट MOV, H.264\nऑडिओ फॉरमॅट्स Linear PCM\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC / SDXC\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nकॅनन पॉवरशॉट इक्सस 140 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/5339-avadhoot-gupte-to-debut-as-an-actor-with-monkey-baat", "date_download": "2018-08-18T10:38:18Z", "digest": "sha1:VC2BNGKXDFNLA26KSNZN7QRDWFZHRYMV", "length": 10832, "nlines": 224, "source_domain": "marathicineyug.com", "title": "गायक - संगीतकार - दिग्दर्शक 'अवधूत गुप्ते' चे ‘मंकी बात’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nगायक - संगीतकार - दिग्दर्शक 'अवधूत गुप्ते' चे ‘मंकी बात’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण\nPrevious Article एन. डी. स्टुडियोत झाली एमटीडीसीच्या 'फिल्मी सहली' ला सुरुवात\nNext Article राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये 'रेडू' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाबरोबरच एकूण ७ पुरस्कार\nख्यातनाम गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते हे नाव सर्वांनाच परिचयाचे आहे. पारंपरिक संगीताला आधुनिक संगीताची जोड देऊन त्यांनी बनवलेली अनेक गाणी महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. संगीतक्षेत्रात आपले एक वेगळे वलय निर्माण केल्यानंतर त्यांनी चित्रपट दिग्दर्शनातही आपला स्वतंत्र ठसा उमटविला. असा हा अष्टपैलू कलाकार निष्ठा प्रॉडक्शन्स निर्मित ‘मंकी बात’ या धमाल बालचित्रपटातून अभिनयात पदार्पण करणार आहेत.\nबालचित्रपट ‘मंकी बात’ येत्या शुक्रवारपासून\nबालचित्रपट ‘मंकी बात’ चा भन्नाट ट्रेलर\n‘वायू’ म्हणतोय ‘श्या... कुठे येऊन पडलो यार.....\n‘मंकी बात’ च्या ‘हाहाकार...’ ला बच्चेकंपनीची पसंती\n‘मंकी बात’ या चित्रपटाबद्दल बोलताना अवधूत गुप्ते म्हणाले की, पहिला म्युझिक अल्बम केल्यानंतर मला अनेक दिग्दर्शकांनी अभिनय करण्याविषयी विचारले होते, मात्र मी तो आपला प्रांत नाही असे सांगत त्यांना टाळले होते. ‘मंकी बात’चे दिग्दर्शक विजू माने हे माझे जवळचे मित्र. त्यांनी मला जेव्हा अभिनयासंबंधी विचारणा केली असता, मी नेहमीप्रमाणेच टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर जेव्हा त्यांनी मला कथा ऐकवली तेव्हा मी क्षणार्धात होकार दिला. अभिनेता म्हणून हा माझा पहिला चित्रपट तर आहेच, पण मी जी भूमिका साकारली ती नक्कीच सर्वांसाठी सरप्राईझ असणार आहे. नेहमीपेक्षा काही वेगळे करण्याचा माझा स्वभाव चित्रपटातही दिसेल याची काळजी दिग्दर्शक विजू माने यांनी घेतल्याचेही अवधूत गुप्तेने नमूद केले.\n‘मंकी बात’ चित्रपटाचे दिग्दर्शन मराठीतील प्रथितयश दिग्दर्शक विजू माने यांनी केले आहे. आकाश पेंढारकर आणि विनोद सातव हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून चित्रपटाची निर्मिती विवेक डी, रश्मी करंबेळकर, मंदार टिल्लू, विजू माने यांनी केली आहे. चित्रपटाचे संवाद आणि गाणी संदीप खरे यांनी लिहिली असून डॉ. सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केली आहेत. असा हा धमाल विनोदी बालचित्रपट येत्या १८ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.\nPrevious Article एन. डी. स्टुडियोत झाली एमटीडीसीच्या 'फिल्मी सहली' ला सुरुवात\nNext Article राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये 'रेडू' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाबरोबरच एकूण ७ पुरस्कार\nगायक - संगीतकार - दिग्दर्शक 'अवधूत गुप्ते' चे ‘मंकी बात’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\nतीच धम्माल मस्ती घेऊन पुन्हा येतोय 'बॉईज 2' ५ ऑक्टोबरपासून\n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेमधील हरहुन्नरी लक्ष्मी म्हणजेच अभिनेत्री 'समृद्धी केळकर' झाली \"कथ्थक विशारद\"\n'अमेय वाघ' करणार 'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स' चं सूत्रसंचालन\n\"अंजली स्वीकारणार सईचं आव्हान\" - पहा 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेचा २ तासांचा विशेष भाग १९ ऑगस्टला\nSony Pictures Network चे मराठी मनोरंजन क्षेत्रातले पहिले पाऊल - Sony मराठी\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\nतीच धम्माल मस्ती घेऊन पुन्हा येतोय 'बॉईज 2' ५ ऑक्टोबरपासून\n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेमधील हरहुन्नरी लक्ष्मी म्हणजेच अभिनेत्री 'समृद्धी केळकर' झाली \"कथ्थक विशारद\"\n'अमेय वाघ' करणार 'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स' चं सूत्रसंचालन\n\"अंजली स्वीकारणार सईचं आव्हान\" - पहा 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेचा २ तासांचा विशेष भाग १९ ऑगस्टला\nSony Pictures Network चे मराठी मनोरंजन क्षेत्रातले पहिले पाऊल - Sony मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2018-08-18T09:59:42Z", "digest": "sha1:KHPJY6HWJGDYAQ6JCRM5FQ4QN5QY7DUY", "length": 4470, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्होल्टास - विकिपीडिया", "raw_content": "\nव्होल्टास ही ही एक टाटा समुहातील कंपनी आहे. या कंपनीची स्थापना इ.स.१९५४ साली झाली.\nक्रोमा • इंडियन हॉटेल्स (ताज हॉटेल•ताज एर हॉटेल•जिंजर हॉटेल) • टाटा केमिकल्स • टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस • टाटा एलेक्सी • टाटा मोटर्स • टाटा पॉवर • टाटा स्टील • टाटा टेलीसर्व्हिसेस टायटन • व्होल्टास • ट्रेंट •\nटाटा स्काय • टाटा बीपी सोलार • टाटा डोकोमो • टाटा एआयए लाइफ इन्श्युरन्स • टाटा एआयजी सर्वसाधारण विमा कंपनी\nजमशेदजी टाटा • रतन जमशेदजी टाटा • जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा • दोराबजी टाटा • रतन टाटा • सायरस पालोनजी मिस्त्री‎\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस • टाटा मूलभूत संशोधन संस्था\nटाटा फुटबॉल अकादमी • बाँबे हाउस‎\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०७:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-18T10:55:26Z", "digest": "sha1:46VIWJGVORTUHAGFQ22QLBYOGKZ3JMYF", "length": 16704, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "राहुल गांधींच्या मातोश्री परदेशी, मायावती पंतप्रधान होऊ शकतात - बसपा - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे…\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची…\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Desh राहुल गांधींच्या मातोश्री परदेशी, मायावती पंतप्रधान होऊ शकतात – बसपा\nराहुल गांधींच्या मातोश्री परदेशी, मायावती पंतप्रधान होऊ शकतात – बसपा\nनवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मातोश्री परदेशी असल्याने राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही, असे सांगत बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती पंतप्रधान पदासाठी योग्य आहेत. मायावतीच मोदींना टक्कर देऊ शकतात, असे पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक वीर सिंह आणि जयप्रकाश सिंह यांनी म्हटले आहे. त्यामुळे विरोधकांना एकत्र आणून महाआघाडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे.\nबहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यात वीर सिंह आणि जयप्रकाश सिंह यांनी पंतप्रधानपदासाठी मायावतींचे नाव पुढे केले. आता पंतप्रधानपदावर मायावतींनी विराजमान होण्याची वेळ आली आहे. राष्ट्रीय राजकारणात मायावतींनी छाप पाडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहांना फक्त ‘दबंग’ मायावतीच रोखू शकतात, असे जयप्रकाश सिंह यांनी म्हटले आहे.\nमायावती फक्त दलित समाजाच्या नेत्या नाहीत, त्यांना समाजातील प्रत्येक वर्गाचा पाठिंबा आहे. राहुल गांधी हे त्यांच्या आईसारखेच दिसतात. त्यांची आई परदेशी असल्याने राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. मायावतींचा तळागाळातील जनतेशी संपर्क असून त्या चार वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीदेखील होत्या. त्यामुळे पंतप्रधानपदावर काम करण्याची क्षमता मायावतींमध्येच आहे, असेही त्यांनी सांगितले.\nPrevious articleजमावाकडून होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी नवीन कायदा करावा- सर्वोच्च न्यायालय\nNext articleडॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून राज्यघटना लिहिली – संभाजी भिडे\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nवाजपेयींच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनाला दिग्गजांची रीघ; फडणवीस यांच्याकडून पार्थिवाचे अत्यंदर्शन\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nमोदी लोकसभेसोबत रशियाची निवडणूकही घेऊ शकतात; संजय राऊतांचा उपरोधिक टोला\nपुण्यातील रॅमी ग्रँड या पंचतारांकित हॉटेलात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश;...\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nआर्थर रोड कारागृहाचा व्हिडीओ दाखवा; मल्ल्याच्या प्रत्यार्पणापूर्वी लंडनच्या न्यायालयाची मागणी\nधक्कादायक: माजी मंत्र्याच्या नोकराने सहा वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करुन केली हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/sj-4000-sports-camera-black-price-pdqmt3.html", "date_download": "2018-08-18T10:12:22Z", "digest": "sha1:N2OST2Z2DFEDRNAYKYUZCBUIVTXHIW42", "length": 15809, "nlines": 409, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्ज 4000 स्पोर्ट्स कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nस्ज 4000 स्पोर्ट्स कॅमेरा\nस्ज 4000 स्पोर्ट्स कॅमेरा ब्लॅक\nस्ज 4000 स्पोर्ट्स कॅमेरा ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nस्ज 4000 स्पोर्ट्स कॅमेरा ब्लॅक\nस्ज 4000 स्पोर्ट्स कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये स्ज 4000 स्पोर्ट्स कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nस्ज 4000 स्पोर्ट्स कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत Jun 26, 2018वर प्राप्त होते\nस्ज 4000 स्पोर्ट्स कॅमेरा ब्लॅकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nस्ज 4000 स्पोर्ट्स कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 9,835)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nस्ज 4000 स्पोर्ट्स कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया स्ज 4000 स्पोर्ट्स कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nस्ज 4000 स्पोर्ट्स कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nस्ज 4000 स्पोर्ट्स कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nस्ज 4000 स्पोर्ट्स कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nअपेरतुरे रंगे F=3.1 f=2.10\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 8MP\nसेन्सर सिझे 1/3 inch\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec sec\nऑडिओ विडिओ इंटरफेस Yes\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 1.5 inch inch\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 8MP and 5MP\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1081 30fps, 720 30 fps\nविडिओ फॉरमॅट 1081 30fps\nउपग्रदेहाबळे मेमरी Yes, 32 GB\nबिल्ट इन फ्लॅश No\nस्ज 4000 स्पोर्ट्स कॅमेरा ब्लॅक\n2/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://info-4all.ru/mr/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B2--i-krasota/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-18T10:00:30Z", "digest": "sha1:SH76V3MFGIMLESVCWTRCYR6NA2M4S2Q7", "length": 20566, "nlines": 328, "source_domain": "info-4all.ru", "title": "Rubric: सौंदर्य - प्रत्येकासाठी उपयुक्त माहिती", "raw_content": "\nजिज्ञासू आणि ज्ञानाबद्दल तहान\nसेवा, काळजी आणि दुरुस्ती\nसेक्युलर लाइफ आणि शोबनेस\nजन्मकुंडली, जादू, दैव सांगणे\nफोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग\nव्हिडिओ रेकॉर्डिंगची प्रक्रिया करणे\nछायाचित्रं प्रसंस्करण आणि छपाई\nउत्पादने खरेदी आणि निवड\nइतर भाषा आणि तंत्रज्ञान\nप्रकाशने आणि लेखन लेख\nस्थायी निवास, स्थावर मालमत्ता\nशहरे आणि देशांविषयी इतर\nहवामान, हवामान, वेळ क्षेत्र\nलेखन पुन्हा सुरू करा\nबदला आणि नोकरी शोधा\nपाळीव प्राण्यांना अनुमती आहे\nइतर आरोग्य आणि सौंदर्य\nकाय आहे आणि कसे करावे\nछातीवर शिलालेख-टॅटू - उत्कृष्ट आणि अर्थाने\nटॅटू मानवी शरीरावर रेखाचित्रे आहेत. आधुनिक जगात तर कोणीही आश्चर्यचकित होत नाही. पूर्वी ते फक्त काही अनौपचारिक समुदायांचा भाग असलेल्या ज्यांची त्वचा त्यांच्यावर लादला होता. वापरलेले ...\nDerma आहे ... लिबरल त्वचेवर फेस क्रीम: पुनरावलोकने\nत्वचेचा त्वचेचा भाग आहे, जो संयोजी उती आहे. त्यात तीन घटक असतात: फायबर, मूलभूत पदार्थ आणि पेशी. त्वचा, मज्जातंतू आणि वाहिन्यांवरील अॅप्पेडेशन्ससाठी हे समर्थन. येथे एक संश्लेषण आहे ...\nप्रचंड कंपनसंख्या असलेल्या (ध्वनिलहरी) पोकळ्या निर्माण होणे: अभिप्राय आणि संपूर्ण सत्य\nकोणतीही गुंतागुंत नाही की कोणत्याही स्त्रीला आदर्श आकृती आणि अतिरिक्त पाउंड्सचे स्वप्न, आपण ते मदत करणार नाही. म्हणूनच जगभरातील महिलांची मोठी संख्या ...\nटॅटू जपानी आहे. जपानी टॅटू आणि त्यांचे अर्थ\nबरेच लोक विचार करतात की गोंदणे बनवावी की नाही. त्याच्या विविध अनेक आहेत एक जपानी टॅटू सर्वात सामान्य आहे. त्याची वैशिष्ट्ये काय आहेत एक जपानी गोंदण म्हणजे काय एक जपानी गोंदण म्हणजे काय थोडेसे इतिहास ... जपानी टॅटू ...\nनिर्दोष सुगंध \"जिमी चू\"\nजिमी चू - पंथ ब्रॅण्डमधून एक सामू वरून सुगंध. तमारा मेल्सन यांच्या मते, कंपनीचे संस्थापक आणि फॅशन डिझायनर जिमी चूचे भागीदार, सुगंध हा अलर्टचा अविभाज्य भाग आहे. तो पूर्णपणे स्त्री आहे, विषयासक्त आहे ...\nकसे एक \"एक bagel सह भोपळा\" करण्यासाठी फोटो\nकेशभूषा \"बन\" किंवा \"घुमणे\" प्राचीन काळापासून ओळखले जाते. हे खरे आहे की, प्रत्येक युगाने तो आपल्याच पद्धतीने दुरुस्त केला. हे शक्य तितके व्हा, आज केश \"बड\" आहे, हे खूप लोकप्रिय आहे, आणि बरेच काही नेहमी आहे ...\nजेल-वार्निश वापरण्याची तंत्रज्ञान सोपे आहे\nहाताने न घालता विना, सुयोग्य उपकरणे न करता, खरोखर योग्य आणि पूर्ण प्रतिमा तयार करणे कठीण आहे नखेचे आंघोळ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानामुळे तुम्ही मैनिक्यूरचे सौंदर्य (4-x आठवड्यांपर्यंत) विस्तारित करू शकता. हे नाही ...\nमीनिकेल पाणी किंवा टॉनिक - ते चांगले आहे\nप्रत्येक स्त्री सुंदर दिसत आहे, विविध सजावटीच्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करते, परंतु, कदाचित सर्वात महत्त्वाचे, चेहर्यावरील त्वचा आहे आणि यासाठी विशेष काळजी आवश्यक आहे. दुर्दैवाने, योग्य एक निवडा ...\nजन्मजात eyelashes किती ठेवा आणि त्यांच्या वापराची वैशिष्ट्ये काय आहेत\nकाय मुलगी मऊ आणि हलका eyelashes च्या स्वप्न नाही, फक्त एक दृष्टीक्षेप पुरुष मोल करणे उत्तर सोपे आहे - फक्त काही जण अशा आनंद नाकारतील. पण, दुर्दैवाने, निसर्ग नेहमीच नाही ...\nस्टाइलिश पांढरा आणि काळा फ्रेंच\nकदाचित, एखादी मुलगी स्वत: ला सुंदर बाहुलीसोबत तिच्या झांज सुशोभित करण्याची इच्छा व्यक्त करते. हे आश्चर्यकारक नाही. अखेर, स्टाइलिश नेल आर्ट स्त्रीच्या प्रतिमा पूर्ण करू शकते. योग्य वेळी निवडलेल्या रंगांमध्ये स्वादवर जोर देण्यासाठी मदत करतात ...\nमॉइस्चराइझिंग बॉडी क्रीम: पुनरावलोकने\nकाही पुरुषांना स्नानगृहात असलेल्या मादीवरील शेल्फ वर विविध प्रकारचे त्वचा निगा उत्पादने प्रथम श्रेणीतील सौंदर्यप्रसाधनांचे दुकान घेते. सिल्हूट दुरुस्त करण्यासाठी छिद्र आणि घासणे, तेल, द्रव, मिश्रणाचा मिश्रण ...\nनखांवर भूमिती. भौगोलिक मॅनिकेशर\nनाखूनमध्ये नाखूनंवर भूमितीची अशी एक गोष्ट आहे. हे काही खास तंत्र किंवा तंत्र नाही. नाही, हे नाखून डिझाइनचे नाव आहे, जे एक भौमितिक नमुना आहे ज्यात कार्यान्वित करता येते ...\nमूळ चित्रकला: छटा तंत्र नियम, वैशिष्ट्ये, परिणाम\nप्रत्येक मुलीची शस्त्रागारात तिच्या सुंदरतेचे अनुकरण केले जाते. सर्वात लोकप्रिय मादी whims एक केस रंगविणे आहे, जे आपण सहजपणे अद्यतनित करू शकता ...\nविजिजिस्ट ओल्गा रोमानोवा एक प्रतिभावान आणि उज्ज्वल विशेषज्ञ आहे\nप्रसिद्ध व्यक्तींचे जीवन त्यांच्या चाहत्यांसाठी आवडते आहे. आणि ज्यांनी प्रतिष्ठित ताऱ्यांसह काम केले आहे, त्यांना या आदर आणि कौतुकाने योग्य आहे. पण तुम्हाला खरोखरच खूप मेहनत घ्यावी लागते, महत्वाची ...\nपृष्ठ 1पृष्ठ 2...पृष्ठ 9पुढील पृष्ठ\nलोड करीत आहे ...\n© कॉपीराइट 2017 - प्रत्येकासाठी उपयुक्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/samsung-smart-wb250f-point-shoot-digital-camera-white-price-p1qoqx.html", "date_download": "2018-08-18T10:19:57Z", "digest": "sha1:5PTJ2J56MRVLOASFTAWS4UX3SL2BAC2M", "length": 22176, "nlines": 531, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग स्मार्ट वब२५०फ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसॅमसंग स्मार्ट वब२५०फ पॉईंट & शूट\nसॅमसंग स्मार्ट वब२५०फ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट\nसॅमसंग स्मार्ट वब२५०फ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसॅमसंग स्मार्ट वब२५०फ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट\nसॅमसंग स्मार्ट वब२५०फ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये सॅमसंग स्मार्ट वब२५०फ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट किंमत ## आहे.\nसॅमसंग स्मार्ट वब२५०फ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट नवीनतम किंमत Jun 18, 2018वर प्राप्त होते\nसॅमसंग स्मार्ट वब२५०फ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईटशोषकलुईस, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nसॅमसंग स्मार्ट वब२५०फ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 15,390)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसॅमसंग स्मार्ट वब२५०फ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट दर नियमितपणे बदलते. कृपया सॅमसंग स्मार्ट वब२५०फ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसॅमसंग स्मार्ट वब२५०फ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 44 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसॅमसंग स्मार्ट वब२५०फ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसॅमसंग स्मार्ट वब२५०फ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 inch\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 1/8 sec\nपिसातुरे अँगल 24 mm Wide-angle\nरेड इये रेडुकशन Yes\nडिस्प्ले तुपे TFT LCD\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 460,000 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1920 x 1080, 30 fps\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 01:01\nमेमरी कार्ड तुपे SDSC / SDHC / SDXC\nइनबिल्ट मेमरी 9.5 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nसॅमसंग स्मार्ट वब२५०फ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%81/", "date_download": "2018-08-18T10:52:57Z", "digest": "sha1:MSEFS3XGKSLAS2JEWWIILJCT6SWUWF5R", "length": 10120, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारा : प्लास्टिक बंदीमुळे व्यापारी वर्ग त्रस्त | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसातारा : प्लास्टिक बंदीमुळे व्यापारी वर्ग त्रस्त\nमायणी : कोणतेही साहित्य खरेदी केल्यानंतर संबंधित व्यापारी, दुकानदाराने दिलेल्या प्लास्किट पिशवीतच ते घेऊन जाण्याची सवय ग्राहकांना लागली आहे. मात्र, आता प्लास्टिक बंदीमुळे खरेदी केलेले साहित्य पिशवीत न दिल्यास ग्राहक ते साहित्य पुन्हा माघारी करत असल्याने व्यापारी वर्गाला प्लास्टिक बंदीचा चांगलाचा फटका बसला आहे. त्यामुळे प्लास्टिक पिशवीला पर्याय शोधण्यासाठी किरकोळ व्यापारी प्रयत्न करत आहेत. परंतु, पर्याय स्वस्त नसल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे.\nकिरकोळ व्यापाऱ्यांकडे खरेदीला येणारा ग्राहक दहा-वीस रुपयांचा माल खरेदी करतो. या दहा वीस रुपयांच्या मालापाठीमागे दुकानदाराला एक किंवा दोन रुपये निव्वळ नफा मिळत असतो. या नफ्यामध्ये त्यांचे दुकान भाडे, गाळाभाडे, बॅंकेचे व्याज व इतर खर्चाचा ताळेबंद त्या दुकानदाराला बसवावा लागतो. प्लास्टिक पिशवीचा पंन्नास ते शंभर नगाचा पुडा साईजनुसार आठ ते पंधरा रुपयांपर्यंत मिळत असे त्यामुळे एक प्लास्टिक पिशवी पंधरा ते पंचवीस पैसापर्यंत दुकानदाराला मिळत होती. त्यामुळे दहा-वीस रुपयांचा खरेदी केलेला मालास पिशवी देताना दुकानदाराला काही वाटत नव्हते.\nमात्र, प्लॅस्टिक पिशवी बंदीमुळे व्यापाऱ्यांकडून येणारा माल चढ्या भावाने मिळत आहे. त्यामुळे किरकोळ दहा वीस रुपयांची खरेदी करणाऱ्या ग्राहकाला कॅरिबॅग देणे परवडत नाही. तसेच पूर्वीसारखी प्लास्टिक पिशवी उपलब्ध होत नाही. त्यामुळे दहा-वीस रुपयांचा बिस्किट पुडा किंव्हा इतर माल घेणाऱ्या ग्राहकाला पिशवी नाही म्हणण्याची वेळ दुकानदारांवर आली आहे. मात्र, ग्राहक अजूनही प्लॅस्टिक पिशवी बंदीच्या मानसिक स्थितीत नसल्याने तो पिशवी मिळविण्यासाठी अहो पाहुण्यांकडे जायचं आहे, दवाखान्यात पेशंट आहे, बिस्किट पुडा हातात घेऊन जाऊ का अशी अनेक कारणे पुढे घेऊन खरेदी केलेला माल तेथेच ठेवून निघून जात आहेत.\nप्लॅस्टिक पिशवीवर पर्यायी कापडी पिशवी व इतर विघटन होणाऱ्या कागदापासून बनवलेले पिशवी असे पर्याय सध्या बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, त्याचे दर किरकोळ दुकानदारांच्या आवाक्‍याबाहेर आहेत. त्यामुळे या पिशव्या दहा वीस रुपयांच्या मालासाठी देणे दुकानदारांना परवडत नाही. त्यामुळे सहाजिकच दुकानदारांचा नाईलाज होत आहे. ग्राहकाला प्लॅस्टिक पिशवी देण्यावाचून दुसरा पर्यायही दुकानदारांसमोर राहत नाही. त्यामुळे प्लास्टिक बंदीचे सध्यातरी तीनतेरा वाजलेले दिसत आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराज्यातील वाढत्या गुन्हेगारीत पीडीपी-भाजपा दोन्ही पक्ष भागीदार -तसादुक मुफ्ती\nNext articleटीकेच्या भडीमारानंतर भाजपचे “एक पाऊल मागे’\nराजवाडा चौपाटीवरील फ्लेक्‍स बोर्डमुळे झाडं सोसतायत मरणयातना\nरेल्वे अपघात एकाचा मृत्यू, घातपाताचा संशय\nजिल्ह्यात दूध संकलनात वाढ आंदोलनाची धार झाली कमी\nहुतात्मा स्मारके प्रेरणास्थळ बनावीत\nजिल्ह्यात कमी निधीमध्ये अधिक सिंचनाचे काम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A6%E0%A5%8D.html", "date_download": "2018-08-18T11:09:24Z", "digest": "sha1:OEJ2P7SFAD4THSE6UDHER6AUKLAME2WD", "length": 21833, "nlines": 289, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | मोदींची वकृत्वक्षमता अद्‌भुतच", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » मोदींची वकृत्वक्षमता अद्‌भुतच\n=शशी थरूर यांची स्तुतिसुमने=\nनवी दिल्ली, [१ फेब्रुवारी] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपात केंद्रात ‘मास्टर कम्युनिकेटर’ आला असल्याचे आज आपण सारेच बघत आहोत. संदेशवहन हीच भाजपाप्रणीत रालोआ सरकारची विशेषत: नरेंद्र मोदी यांची ताकद आहे. मोदी यांची वकृत्व क्षमता अद्‌भुत अशीच आहे, अशी स्तुतिसुमने कॉंगे्रस खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी उधळली.\n‘‘भाषण देण्यात मोदी खरोखरच मास्टर आहेत. त्यांची नारेबाजी, आवाजातील चढ-उतार, त्यांची वेशभूषा याची बरोबरी कुणीही करू शकत नाही. ते मास्टर कम्युनिकेटर आहेत. त्यांच्यातील हा गुण इतर कुणातही नाही,’’ असे शशी थरूर यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.\nथरूर यांनी यापूर्वी मोदी यांची स्तुती केली आहे आणि त्यासाठी त्यांना कॉंगे्रस नेतृत्वाच्या रोषाचा सामनाही करावा लागला होता. तथापि, पक्षाला न जुमानता त्यांनी आज रविवारी पुन्हा एकदा मोदी यांची स्तुती केली. या देशातील नागरिकांनी मोदी यांच्या रूपात ‘मॅन ऑफ ऍक्शन’ला निवडून दिले आहे. त्यामुळे मोदी यांनी देशवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तातडीने कृती करायला हवी. कारण, देशातील जनता त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे, असेही त्यांनी सांगितले. याचवेळी त्यांनी आपण भाजपाच्या वाटेवर असल्याच्या वृत्ताचे खंडन केले. माझी संस्कृती कॉंगे्रसी आहे आणि आयुष्यभर मी कॉंगे्रसमध्येच राहणार आहे, असे ते म्हणाले.\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (2139 of 2453 articles)\nमेक इन् विदर्भच्या स्वप्नपूर्तीसाठी हातभार लावा\n=मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन, हिंगणा एमआयडीसी असोसिएशनचा वर्धापन दिन= नागपूर, [१ फेब्रुवारी] - येत्या काळात विदर्भात उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.ganpatipule.co.in/Mar/Donation", "date_download": "2018-08-18T10:47:24Z", "digest": "sha1:V4TAVRFUTNTIMSILTBQC47LAOZL6QTB4", "length": 2654, "nlines": 51, "source_domain": "www.ganpatipule.co.in", "title": "Ganpatipule Temple - Donation, Donate online for pooja and abhisheks in ganpatipule temple, Ganpatipule temple in ratnagiri maharashtra", "raw_content": "\nहे करा, हे करू नका\nदेवस्थान मार्फत सुरु असलेल्या पूजा अभिषेक\nदेवस्थान मार्फत करण्यात येणाऱ्या पूजा / अभिषेकांच बुकिंग तुम्ही ऑनलाइन करू शकता. बुकिंग करण्यासाठी खालील अभिषेक किंवा पुजेवर क्लिक करा आणि पूर्णपणे सुरक्षित पेमेंट गेटवे ने पेमेंट करा. आपले बुकिंग पूर्ण झाल्यावर अभिषेक / पूजा केली जाईल.\n२१ वर्ष अभिषेक ( वर्षातून एक दिवस )\nभक्तनिवास ऑनलाइन पुजा / अभिषेक सेवा ऑनलाइन देणगी स्थानाची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0_(%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2018-08-18T09:58:25Z", "digest": "sha1:6FLIHQWD7DK4IUMV5TSMQSJ2IBUXPBCE", "length": 4677, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अवतार (इंग्लिश चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "\nअवतार हा जेम्स कॅमेरोन दिग्दर्शीत इंग्रजी चित्रपट आहे. या चित्रपटाने उत्पन्नाचे आजवरचे सर्व विक्रम मोडित काढले आहे. ग्राफिक्सचा अत्यंत प्रभावी वापर व ३ मिती चित्रीकरण हे या चित्रपटाचे वैशिट्य आहे.\nइ.स. २००९ मधील इंग्लिश भाषेमधील चित्रपट\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०५:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://krupasindhumasik.blogspot.com/2012/06/blog-post.html", "date_download": "2018-08-18T10:06:26Z", "digest": "sha1:EJYDDDRWGWB6SVGGGW6R6ZEBS32WA5DO", "length": 4161, "nlines": 74, "source_domain": "krupasindhumasik.blogspot.com", "title": "KRUPASINDHU MASIK: कृपासिंधु मासिक जून २०१२", "raw_content": "\nअनुभव इथे पोस्ट करु शकता...\nकविता इथे पोस्ट करु शकता...\nकृपासिंधु मासिक जून २०१२\nमे २०१२ महिन्याच्या अंकाची अनुक्रमणिका\nसंपादकीय- अजित पाध्ये (२)\nबापू तूच तारणहार - भूषण नाईक, पुणे\t(३)\nबापू माझा तारणहार - दीपावीरा कोरान्ने (५)\nइतुके अनंत प्रेम फक्त त्याचे\t- डॉ. केशवसिंह नर्सीकर, वाशी (८)\nशरणागत वत्सलम्‌ श्री अनिरुद्धम्‌\t- गौरी पेंडसे, दोहा (कतार) (११)\nदेई निरंतर, चरणसेवा...\t- हेमावीरा अष्टपुत्रे (१३)\nज्याच्या शिरी बापूंचा हात, त्याची कलिकाळावरही मात\t- कुसुम दरेकर, नाशिक (१७)\nनकळत सारे घडले\t- माधवी टिळवे (२०)\nअंजनामाता वहीचा अनुभव\t- मनिषावीरा कारखानीस (२३)\nचरमकृपालु बापू अनुरागी\t- रंजना नायक, मेलबॉर्न, ऑस्ट्रेलिया (२५)\nश्रीकंठकूपपाषाण पूजन - एक अभूतपूर्व अनुभव\t- रविंद्रसिंह बदियानी, गिरगाव\t(२९)\nश्रीगुरुक्षेत्रम्‌ मंत्राने बाधा दूर झाली\t- सुदेश घरत, पालघर (३१)\n\t- उर्मिल म्हात्रे (३३)\nक्लेशनिवारक श्रीअनिरुद्ध कवच (भाग - २)\t- डॉ. योगिंद्रसिंह जोशी\t(३७)\nफिटे अंधाराचे जाळे\t- संजिवसिंह सुळे, वडगांव (४१)\nकृपासिंधु तू, तू अनिरुद्ध (भाग - ५)\t- सदानंदसिंह वर्तक (४७)\nसंताघरची उलटीच खूण\t- प्रशांतसिंह गडकरी (५३)\nकृपासिंधु मासिक जून २०१२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://savarkar.org/mr/nibandha.html", "date_download": "2018-08-18T09:57:35Z", "digest": "sha1:6YKNNSAVM3RL54MILRRJIZUBXQNMDFXQ", "length": 1689, "nlines": 7, "source_domain": "savarkar.org", "title": " जात्युच्छेदक निबंध", "raw_content": "\nप्रस्तुतच्या जातीभेदाचें इष्टानिष्टत्व ‘मला वाटते की, देशाच्या राजकीय, सामाजिकप्रभृती परिस्थितीचें आणि ती सुधारण्यासाठी ठरलेल्या सिद्धान्तप्राय उपायांचें ज्ञान मुलांना लहानपणापासूनच करून देणें अत्यंत आवश्यक झाले आहे. राजकीय सिद्धान्तांचें नि सामाजिक प्रेम यांचें विद्यार्थ्यास लहानपणापासूनच बाळकडू देणें (जसें अवश्य) तद्वतच जातीभेद, जातीद्वेष नि जातीमत्सर यांचे योगाने आमचा देश कसा विभागला जात आहे, कसा भाजून निघत आहे, कसा करपून जात आहे याचेंही ज्ञान राष्ट्रीय शाळेतील मुलांना मिळालें पाहिजे; जातीभेद सोडण्याची ..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z180523085334/view", "date_download": "2018-08-18T09:56:31Z", "digest": "sha1:SW52TKK4MDPJEU5N7CVLGGVHEPDOLF5E", "length": 22307, "nlines": 179, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सारस्वत चम्पू - सर्ग ६", "raw_content": "\nहल्ली महिला पौरोहित्य करतात हे धर्मसंमत आहे काय\nसंस्कृत सूची|संस्कृत साहित्य|पुस्तकं|सारस्वत चम्पू|\nसारस्वत चम्पू - सर्ग ६\nपंचतत्वमय सत्वरुपि जो जगदात्मा हृषिकेशी \nसृष्टिचक्र जो चालवि नियमें मायातित अविनाशी ॥\n जगता सुसंस्कृती देवो ॥१॥\n किती बुद्धिमान, देवादिकांनीं तोंडांत बोटेंच घालावी इतके चातुर्य माझ्यांत असेल, असें मला वाटलेंच नाही; देवेंद्र रत्नपरीक्षक; अलंबुषेला उगीच पुढें केली, कोणाच्या धीरावर, तर वैजयंतीच्या; माझ्या बुद्धीची, चातुर्याची महति त्याला पूर्ण माहीत होती. आतां पहा -\nपद (चाल - शिवलि बरें झालें०)\nखचित मला गमलें, आतां \n आतां ॥ शक्ति मुनीची सर्व भंगली \nगुरुकुल सारें धुडकुनि देतें \nकाय पहा, ते ऋषि म्हणजे खदिरांगार, सूर्यमंडळावर जाववेल पण त्या मुनींजवळ जाणें म्हणजे भस्मच होणें; तेज तरी किती प्रखर, जणूं काय सारें जग भस्मच होऊन जाईल. ते ऋषि, सरस्वतीच्या तीरावर असले म्हणजे नदीचें शीतल जल लाल झाल्यासारखें दिसूं लागतें. आम्ही तर -\nसरस्वतीतचि स्नाना करितां पाहुनि मुनिच्या त्या नयनां \nकंप भरे किति ताप बाधती वरती करवे नच वदना ॥\nगायनवादन सर्वहि हरलें थरथर कांपे तैं रसना \nअलंबुषा देवीचा गेला धीर सोडुनी कधिंच मना ॥१॥\nबोलायला सारें सुलभ पण प्रसंग आला म्हणजे अंग होतें धैर्यभंग; काय पहा.\nपाहुनियां दिव्यतेजधारि ते मुनी \nभीतीची बीज बसे चपल मन्मनीं ॥\n न सुटे तैं वदनिं श्वास \nमग केलें काय, सरस्वती देवीचें केलें स्तवन : देवी सरस्वती \nपद (चाल - नंदनवन देवीने०)\nसरस्वतीदेवी तुज भावें माळ मनोमय कमलांची \nअर्पितसों ही सप्रेमानें लाज राख या अबलांची ॥\nमुनितप दुर्भेद्यचि दुर्गाला वज्रपाणि तो बहु भ्याला \nगलितधैर्य या आम्ही बाला लागतसों तव चरणाला ॥\nवरदाती तूं विश्वदीपिका सरिद्वरा जगत्रयजननी \nइच्छित वरदानातें देउनि मुक्त करीं मुनिभयांतुनी ॥१॥\nकाय तरी चमत्कार, सरिद्वरा सरस्वती, आम्हां स्त्रियांची-अप्सरांची अभिमानी-भगिनी किती तरी तिचें तेज \nपद (चाल-बायांनो द्या सोडोनी०)\n हृदयाचें झालें पाणी ॥\nधरुनियां स्वयें निज पाणी आलिंगुनि दावी ममता ॥१॥\nभीति तर किती भीति, ऋषीच्या तपोतेजानें शापवन्हींत भस्म होऊं ही एक भीति; जगज्जननी सरस्वती, आलिंगन देण्यास सरसावते तिच्या सन्निध जावें तरी कसें ती आम्हां अप्सरांस अस्पृश्य मानील. ही तर मोठी भीति. आम्ही कीं नाही. कितीहि प्रौढी सांगितल्या, तरी आमचे दोष आम्हांला मागे ओढतातच, पण देवी सरस्वतीनें:\nपद (चाल - बायांनो द्या०)\nधरुनियां स्वयें निज हृदयीं बोलाचें माले न होई \n लाजवी गुणें नवनीता ॥२॥\nअलंबुषा झाली गर्भगळीत, मी तर अगदीं भयचकित; जिव्हा उचलत नाहीं, हात हालत नाहींत, डोळे अधीर आणि कर्ण बधिर. तेव्हां,\n निज अमृतकर शिरिं ठेवी ॥\nप्रेम तें अमोलिक दावी पूज्य जी स्वयें त्रिजगता ॥३॥\nपण हें मीं कोणाशी बोलतें आहें माझ्याच देहाशी; तें का माझ्याच देहाशी; तें का हें अरण्यगायन ऐकणार तरी कोण हें अरण्यगायन ऐकणार तरी कोण तसें नाहीं, तडागांत जल तुंबले खरें. झालें, सरस्वतीचें अभय वरदान तर मिळालेंच; अलंबुषेला म्हटलें, आतां मनाचा धीर कर आणि गायनाचा गजर उडवून दे, राग, उपराग, भार्या, मूर्च्छना, यांचा तनाना सारखा चालूं दे. हा पहा संध्याराग, नभोनील आगारांत रांगतो आहे आणि संध्याकाळ, रविशशीच्या संधिकाळांत खुलतो आहे. आपल्या त्या षडज्‍, गांधार सुरांस तनखा दिला म्हणजे सुरासुरांच्या उरास विळखा बसतोच आहे, मग मुनीच्या नेत्रांस कसा अंधार करणार नाहीं तसें नाहीं, तडागांत जल तुंबले खरें. झालें, सरस्वतीचें अभय वरदान तर मिळालेंच; अलंबुषेला म्हटलें, आतां मनाचा धीर कर आणि गायनाचा गजर उडवून दे, राग, उपराग, भार्या, मूर्च्छना, यांचा तनाना सारखा चालूं दे. हा पहा संध्याराग, नभोनील आगारांत रांगतो आहे आणि संध्याकाळ, रविशशीच्या संधिकाळांत खुलतो आहे. आपल्या त्या षडज्‍, गांधार सुरांस तनखा दिला म्हणजे सुरासुरांच्या उरास विळखा बसतोच आहे, मग मुनीच्या नेत्रांस कसा अंधार करणार नाहीं ही पहा वसंताने कशी बहार उडविली आहे ती.\nपद [चाल - नंदनवन देवीनें०]\nसरस्वतीच्या जलीं मनोहर पुष्पवाटिका नव रचिली \nगुलाब चंपक पारिजात या तरुपंक्तींनीं नदि भरली ॥\nबकुल मालती पुष्प सुगंधें भ्रमर गुंजती चहूंकडे \nवाटे तेव्हां मुनिमन नगिंचे ढांसळोनियां पडति कडे ॥१॥\nकितीही सांगितलें, भाकितलें तरी अलंबुषेला धीरच होईना, तुंबराचा तुंबरा दिला हातांत, पण काय उपयोग शूरत्वावांचून तरवार कशी वार करील शूरत्वावांचून तरवार कशी वार करील \nपद [ चाल - रुचती का तीर्थ०]\nमुनिवर ते स्नानसंध्याकार्यार्थी पातले \nनवरचना पाहुनीयां विस्मितसे भासले \nनासाग्रीं लावुनीयां दृष्टी तैं बैसले \nनच बघवे रुप त्यांचें मन माझें खळबळे ॥१॥\nसरस्वतीच्या वरप्रसादानें, त्या ऋषींच्या तेजाचा दाह आम्हांला बाधा करणार नाहीं, इतका जरी मनाला धीर आला, तरी नदीच्या जलावर ती येण्यास देह बधिर झाल्यासारखा दिसूं लागला; तेव्हां,\nसरस्वतीचें गुप्तलिंगन अलंबुषा देवीला \nसांगे मुनिंच्या मनोललाटा विषयगंध लेवविला ॥\n ठेवीं निश्चल मन वाणी ॥१॥\nकाय पहा, सरस्वतीच्या जळावर, बसणें, उठणें, विहरणें म्हणजे भूमीवरच्याप्रमाणें, ही दिव्य कला, आम्हां अप्सरांनाच साध्य, म्हणून भारीच गर्व होता, पण तो सर्व या ऋषींनी मोकलून दिला; ते मुनि, नदीजलाला स्पर्श न करतांच अंतराळांत पादुकांनी झपाझप उडतात, मग तर आमची गाळणच उडाली; ते ऋषि जितके येतात आम्हांजवळ, तितकी होते आमची पळापळ -----\nअरे, पण विसरलें, सरस्वतीचें चित्र घेण्यास चुकलें, शचीदेवीच्या वस्तुसंग्रहालयांत, हें चित्र विचित्रच होणार होतें ........ नाहीं, ती दैदिप्यमान्‍ मूर्ति माझ्या हृदयांतून कशी निघून जाईल सरस्वतीचें चित्र कसें बसें रेखीनच, पण तें दिव्य तेज कसें काढवेल सरस्वतीचें चित्र कसें बसें रेखीनच, पण तें दिव्य तेज कसें काढवेल होंईल, त्या चित्राला विद्युत्प्रकाश दिला तर कांही अंशी होईल. हा, हा, काय तरी तिचें रुप:-\nपद (चाल - सतनु करावा पुन्हां०)\nअधोवदन तो मदन जाहला पाहुनि जिचिया स्वरुपाला \nलाज घेत तो शशांक गगनीं अपत्र प्रवाहीं मग लपला ॥\nअस्ता गेला वासरमणि परि तारागण नच ये वरता \nग्रहगण सारा निष्प्रभ दिसला प्रकट भासवी वन्हिलता ॥१॥\nचित्र कसें तरी रेखीनच, पण त्या देवीचे मनमोहक बोल कसे दाखवतां येतील \nमनमोहक ते सुधारसाहुनि गोड शब्द त्या श्रवणपंथीं \nमनोमया त्या तारेंतुनियां जाऊनि हृदया द्रव करिती ॥\nवाटे अमृत वर्षावचि का भोगावतीचा शितल झरा \nवाणि नव्हे ती खाणिच भासे अर्थप्रसव तो दिव्य हिरा ॥२॥\nत्या सरस्वतीचें, तेजोमान रुप, आणि अमृतमधुर वाणी स्वर्गांगनांना दाखवून कुतूहल करण्यास पाहिजच होतें. आणि तें प्रदर्शन पाहण्याकरतां, वैकुंठविलासी लक्ष्मी आणि कैलासनिवासी पार्वती, या देवी येऊन गर्वहीन होऊन गेल्या असत्या; आणि ब्रह्मदेवाला तर तसें स्वरुप निर्माण करण्यास अभिनव विद्युत मनोमय मूस ओतावी लागणार होती; आणि माझें भूमंडळावर आगमनाचें सार्थक्य अगणितच झाले असतें. पण करावें कसें ..... हं, आलें लक्षांत, वैजयंतीच्या कल्पनासृष्टींत काय काय भरले आहे तें परमेष्टीच्याहि अदृष्टी खास असणार नाहीं. आतां पहा. -\nचित्रकलेचें मर्म जाणता तमहारी भास्कर तो \nध्वनिवाहकता वायुदेव हें कार्य सहजची करितो ॥\n करितें बहुविध खेळाया ॥१॥\nबरें, पण, अंतिम कार्य साध्य होण्यापूर्वीच का ह्या सार्‍या मनाच्या कल्पना दृश्यसृष्टींत आणि कल्पनासृष्टींत कल्पनांतीत अंतर; तर हे सारे बोल, फोलच आहेत. त्यां ऋषीचें आम्हांजवळ आगमन आणि आम्ही करतों पलायन; मग यांत साधन तें काय साधणार दृश्यसृष्टींत आणि कल्पनासृष्टींत कल्पनांतीत अंतर; तर हे सारे बोल, फोलच आहेत. त्यां ऋषीचें आम्हांजवळ आगमन आणि आम्ही करतों पलायन; मग यांत साधन तें काय साधणार उभयतांच्या संगमावाचूंन कृतकृर्माला यश तरी कसें येणार उभयतांच्या संगमावाचूंन कृतकृर्माला यश तरी कसें येणार असो. आतां तरी झालें तें कांहीं कमी झालें नाहीं -\nवीणावादन गायन परिसुनि नागापरि मुनि डोले \nअलंबुषादेवीच्या लीलांवरती लावुनि डोळे ॥\n टकमक बघति रुपकाया ॥१॥\nएकावर एक चिंता, चिंतेच्या गर्तेत एकदां मन पतन पावलें म्हणजे मग मुक्त होण्याचें साधनच मिळत नसतें, हें खरें; शांत, दांत विषयविरत मुनीशीं सामना; मग, कामना, वासना यांचा नायनाटच झाला पाहिजे. अलंबुषा म्हणते, ऋषीच्या शापवन्हींत भस्म होऊन जाऊं, तर त्यांच्या तपोभंगाची दुष्ट वासना मनांत काय म्हणून आणलीस अंगसंगावांचून तपोभंग करण्यास अनगाचें अंतरंग निराळेंच झालें पाहिजे ..... हो,पण येथें वेळ किती होतो, हें तर अगदीं कळत नाहीं, हा पहा -\nपद (चाल - व्हावा लाभ तुझा०)\n प्राग्वधु शोधित जात रवी ॥\n सागर पवनें खवळविला ॥\n सरिताजल कौतुक पाहे ॥\n संध्याकर्मी रत झाला ॥२॥\nक्रि.वि. १ चटकन ; झटकन . २ चुटकीसरशी ; एका क्षणांत , निमेषांत . [ घ्व . ]\nसंत ज्ञानेश्वरांनि हे म्हटले आहे का \nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/5297-popular-singers-sing-the-greatness-of-maharashtra-through-majha-maharashtra-song", "date_download": "2018-08-18T10:34:23Z", "digest": "sha1:DIA5IAICGO7YZYYIPVY2AZ5LJBVUSUKL", "length": 10304, "nlines": 216, "source_domain": "marathicineyug.com", "title": "महाराष्ट्राची महती सांगणारं \"माझा महाराष्ट्र\" या गीताला नामांकित गायकांचा आवाज - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nमहाराष्ट्राची महती सांगणारं \"माझा महाराष्ट्र\" या गीताला नामांकित गायकांचा आवाज\nPrevious Article 'रोहित राऊत' ने लातूरला सुरू केली मर्म म्युझिक अकादमी\nNext Article सिनेमाच्या टीझर पोस्टरद्वारे समजला ‘रेडू’ चा नेमका अर्थ\nमहाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रोसाउंड निर्मित आणि सुप्रसिद्ध संगीतकार तसेच गीतकार अभिजित जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेली एक भव्य कलाकृती म्हणजे \"माझा महाराष्ट्र\" हे गीत होय. या गाण्यामध्ये एकूण बारा मराठमोळ्या नामांकित गायकांचा समावेश आहे. ज्यात साधना सरगम, आनंदी जोशी, अवधूत गुप्ते, अजित परब, वैशाली भैसन-माडे, प्रसन्नजीत कोसंबी, ऋषिकेश कामेरकर, उर्मिला धनगर, सोनाली पटेल, अभिजीत कोसंबी, अभिषेक मारोटकर, श्रीरंग भावे, अभिजीत जोशी यांचा समावेश आहे. महाराष्ट्राची कला, परंपरा-संस्कृती आणि आधुनिकतेचे दर्शन घडवणारी ही कलाकृती महाराष्ट्रातील प्रत्येकाला अभिमान वाटावी अशीच आहे. प्रसिद्ध साउंड इंजिनिअर संदीप बारस्कर या गाण्याचे निर्माते असून शांतनू रोडे यांनी या गीताचे दिग्दर्शन केले आहे. या गीताचे छायांकन आशुतोष आपटे यांचे आहे, तर संगीत संयोजन उदय साळवी यांनी केले आहे. टाइम्स गृप हे गाणं प्रसिद्ध करत असून यशराज स्टुडिओ मध्ये हे गाणे तयार करण्यात आले आहे.\nमूळचे नागपूरचे असलेले अभिजीत जोशी यांनी याआधी अनेक मराठी सिनेमांसाठी गीतकार- संगीतकार म्हणून काम केले आहे. यामध्ये \"हरी ओम विठ्ठला\", \"अगडबंब\", \"कामापुरता विमा\", \"सुपारी पालखी\", \"जयजयकार\", \"लक्ष्मी येई घरा\", \"हर हर महादेव\" या चित्रपटांचा समावेश आहे. शंभरहुन अधिक अल्बम्स, जिंगल्स आणि चित्रपट मिळून तीनशेहुन अधिक गाणी अभिजीत जोशी यांच्या नावावर आहे. सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकारांबरोबर अभिजीत यांनी काम केले आहे. शासनाच्या अनेक योजनांवर आधारित गाणीही अभिजीत यांच्या नावावर आहे. मा. मुख्यमंत्री, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आणि अमृता फडणवीस यांचा समावेश असलेले \"रिव्हर मार्च\" हे सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेले गाणेदेखील अभिजीत जोशी यांच्या नावावर आहे.\nPrevious Article 'रोहित राऊत' ने लातूरला सुरू केली मर्म म्युझिक अकादमी\nNext Article सिनेमाच्या टीझर पोस्टरद्वारे समजला ‘रेडू’ चा नेमका अर्थ\nमहाराष्ट्राची महती सांगणारं \"माझा महाराष्ट्र\" या गीताला नामांकित गायकांचा आवाज\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\nतीच धम्माल मस्ती घेऊन पुन्हा येतोय 'बॉईज 2' ५ ऑक्टोबरपासून\n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेमधील हरहुन्नरी लक्ष्मी म्हणजेच अभिनेत्री 'समृद्धी केळकर' झाली \"कथ्थक विशारद\"\n'अमेय वाघ' करणार 'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स' चं सूत्रसंचालन\n\"अंजली स्वीकारणार सईचं आव्हान\" - पहा 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेचा २ तासांचा विशेष भाग १९ ऑगस्टला\nSony Pictures Network चे मराठी मनोरंजन क्षेत्रातले पहिले पाऊल - Sony मराठी\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\nतीच धम्माल मस्ती घेऊन पुन्हा येतोय 'बॉईज 2' ५ ऑक्टोबरपासून\n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेमधील हरहुन्नरी लक्ष्मी म्हणजेच अभिनेत्री 'समृद्धी केळकर' झाली \"कथ्थक विशारद\"\n'अमेय वाघ' करणार 'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स' चं सूत्रसंचालन\n\"अंजली स्वीकारणार सईचं आव्हान\" - पहा 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेचा २ तासांचा विशेष भाग १९ ऑगस्टला\nSony Pictures Network चे मराठी मनोरंजन क्षेत्रातले पहिले पाऊल - Sony मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE_%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%B0_%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-08-18T09:59:32Z", "digest": "sha1:PV5ALQ2IVBSQ2RYKSSCB4UHW3XL4H5OD", "length": 5722, "nlines": 176, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विल्यम बटलर यीट्स - विकिपीडिया", "raw_content": "\n२८ जानेवारी, १९३९ (वय ७३)\nविल्यम बटलर यीट्स (William Butler Yeats; १३ जून १८६५ - २८ जानेवारी १९३९) हा एक आयरिश कवी व विसाव्या शतकातील आघाडीचा साहित्यिक होता. त्याला १९२३ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. हा मान मिळवणारा तो पहिला आयरिश साहित्यिक होता.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nहासिंतो बेनाव्हेंते साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते\nइ.स. १८६५ मधील जन्म\nइ.स. १९३९ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जुलै २०१५ रोजी १२:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.tarunbharat.com/news/461171", "date_download": "2018-08-18T10:25:27Z", "digest": "sha1:XHCVP7JUB64F4R4KBSBYVAHI74AJMJQC", "length": 9221, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शालेय विद्यार्थ्यांना गुंतवणुकीचे महत्व कळायला हवे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » शालेय विद्यार्थ्यांना गुंतवणुकीचे महत्व कळायला हवे\nशालेय विद्यार्थ्यांना गुंतवणुकीचे महत्व कळायला हवे\nसिंगापूर सारख्या देशात आर्थिक गुंतवणुकीचे महत्व विद्यार्थ्यांना शालेय स्थरावरच शिकविले जाते, त्यामुळे भविष्यात या विद्यार्थ्यांना कोणतीच आर्थिक समस्या निर्माण होत नाही. त्याच धर्तीवर आपल्या देशात व खास करून गोव्यात शालेय स्थरावरच विद्यार्थ्यांना आर्थिक गुंतवणुकीचे महत्व शिकविले पाहिजे असे विधान डॉ. सेल्सो फर्नांडिस यांनी केले.\nपेशाने दंत चिकित्सक असलेले डॉ. सेल्सो फर्नांडिस हे आज गोव्यातील एक आघाडीचे आर्थिक गुंतवणूक तज्ञ बनले आहेत. त्याच्या ‘लेट चैस मनी यू’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवार दि. 3 मे रोजी होत असून त्यानिमित्त घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. फर्नांडिस यांनी वरील विधान केले.\nडॉ. सेल्सो फर्नांडिस हे गेली 20 वर्षे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होते. मडगाव व नावेली येथे त्यांची दोन क्लिनिक कार्यरत होती. पण, त्यांनी आर्थिक गुंतवणूकीवर अभ्यास करण्यास प्रारंभ केला व मडगावातील क्लिनिक बंद करून आर्थिक गुंतवणूक या विषयावर जास्त लक्ष केंद्रीत केले. आज, संपूर्ण गोव्यात त्यांची आर्थिक गुंतवणूकीवर मार्गदर्शन शिबीरे होत असतात.\nआज आर्थिक गुंतवणूक खुपच महत्वाची बनली आहे. जर आर्थिक गुंतवणूकीकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात त्याचे जबर परिणाम सर्वांनाच सहन करावे लागणार असल्याचे मत यावेळी डॉ. फर्नांडिस यांनी व्यक्त केले. आज डॉक्टर, इंजिनियर हे सुद्धा रोजंदारीवर काम करणाऱया कामगारासारखेच आहे. जर त्यांनी आपली प्रेक्टीस केली नाही तर त्यांना पैसा मिळणार नाही. हा पैसा व्यवस्थित गुंतविला तर ते भविष्यात सुखी-समाधानी जीवन जगू शकतात असे मत यावेळी व्यक्त केले.\nआज डॉ. सेल्सो फर्नांडिस हे नव विवाहिताना देखील आर्थिक गुंतवणूकीचे महत्व पटवून देतात, नवरा-बायको यांच्यात आर्थिक गुंतवणूकीच्या संदर्भात एकमत असेल तरच भविष्यात संसार सुखाचा होऊ शकतो, अन्यथा परिस्थिती वाईट असते, आज माणसांचे राहणीमान बदलले आहे. माणसांच्या गरजा वाढल्या आहेत. या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा हा हवाच असतो, त्यामुळे पैसा व्यवस्थित गुंतविल्यास पैशांची कधीच समस्या भासणार नसल्याचा दावा देखील त्यांनी केला.\nडॉ. फर्नांडिस यांनी नवे मार्ग फांऊडेशनची स्थापना केली असून या फांऊडेशन व लायन्स क्लबच्या माध्यमातून समाज सेवेचा उपक्रम देखील हाती घेतला आहे. मडगाव, नावेली, केळशी, फोंडा, कुडचडे, काणकोण, झुवारीनगर, अळदोणा इत्यादी परिसरातील काही स्कूलांना सुलभ शौचालये उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले आहे.\nया पूर्वी डॉ. फर्नांडिस यांचे ‘हू सेस् मनी डॉन्ट ग्रो ऑन ट्री’ (कोण म्हणतोय झाडाला पैसे लागत नाही) पुस्तक प्रकाशित झाले असून या पुस्तकाने अनेकांना गुंतवणूकीचा सर्वोत्तम मार्ग दाखवून दिला आहे. या पुस्तकाचे लेखन व संपादन श्री पवन यांनी केले आहे.\nछायापत्रकार संघटनेची कार्यकारिणी निवड\nराष्ट्रीयीकरण नव्हे, राष्ट्रीय महत्वाच्या नद्या\nफातोर्डा मतदारसंघाचा विकास गोमंतकीयत्वाचे प्रतीक\nकेपे येथे होणार ‘शंभुराजे’ महानाटय़ाचे प्रयोग\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95.html", "date_download": "2018-08-18T11:11:05Z", "digest": "sha1:HKPUEDUXHSXF4XCGBHXY5THRBEEWG4GJ", "length": 24526, "nlines": 294, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | केजरीवाल सरकार नव्या संकटात", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » केजरीवाल सरकार नव्या संकटात\nकेजरीवाल सरकार नव्या संकटात\n=विधिमंत्र्याची शैक्षणिक पदवीच निघाली बोगस, हायकोर्टाने दिले चौकशीचे आदेश=\nनवी दिल्ली, [२८ एप्रिल] – स्वच्छ राजकारण, प्रामाणिक आणि पारदर्शक व्यवहार अशा मोठमोठ्या गप्पा मारून दिल्लीच्या राजगादीवर विराजमान झालेल्या अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी आणि त्यांचे सरकार आता नव्या वादात अडकले आहे. केजरीवाल सरकारमधील विधिमंत्री जितेंद्रसिंह तोमर यांची कायद्याची पदवीच बोगस निघाल्याने दिल्लीच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.\nतोमर यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करताना आपण विधि विषयातील पदवीधर असल्याचे सांगताना तसे प्रमाणपत्रही व पदवीही जोडली होती. बिहारमधील ज्या विद्यापीठातून आपण ही पदवी घेतल्याचा दावा त्यांनी केला होता, त्याच विद्यापीठाने तोमर यांचा खोटारडेपणा चव्हाट्यावर आणला आहे.\nआमच्या विद्यापीठात तोमर यांच्या शैक्षणिक पात्रतेची कोणतीही नोंद नसून, त्यांनी सादर केलेले पदवीविषयक प्रमाणपत्र बनावट असल्याचे विद्यापीठाने दिल्ली उच्च न्यायालयात स्पष्ट केले. यातही धक्कादायक म्हणजे, तोमर यांनी एक नव्हे, तर चक्क दोन स्वतंत्र विद्यापीठाच्या पदव्या घेतल्याचा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्याकडे या दोनपैकी एकाही विद्यापीठाची पदवी नसल्याचे समोर आले आहे.\nबोगस कायद्याच्या पदवीच्या आधारे तोमर यांनी वकिली करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या बार कौन्सिलकडे नाव दाखल केल्याचा आरोप झाल्यानंतर बिहारच्या भागलपूर विद्यापीठाने न्यायालयात चौकशी अहवाल सादर केला. तोमर यांनी आपल्या पदवी प्रमाणपत्रावर जो अनुक्रमांक दिला, तो क्रमांक अन्य एका व्यक्तीचा आहे. तोमर यांच्याविषयी आमच्याकडे कोणतीही नोंद नसल्याने त्यांनी सादर केलेली पदवी बनावट असल्याचे विद्यापीठातर्फे न्यायालयात स्पष्ट करण्यात आले.\nविधिशाखेची पदवी बोगस असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तोमर यांनी उत्तरप्रदेशच्या डॉ. राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठातून प्राप्त केलेली विज्ञान शाखेची पदवीही बोगस असल्याचेच सिद्ध झाले आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाने डॉ. राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठाला अहवाल सादर करण्यास सांगितले होते. तोमर यांनी या विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी घेतल्याचा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात अवध विद्यापीठानेही तोमर यांची पदवी बोगस असल्याचे दिल्ली बार असोसिएशनला कळवले आहे. आता हा अहवाल लवकरच न्यायालयात सादर होणार आहे. दरम्यान, आपल्याविरोधात हा कट असून, आपण कोणताही बनावटपणा केला नाही. माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यानंतरच मी राजीनामा देईल, अशी भूमिका तोमर यांनी घेतली आहे.\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nमुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत भारतीय\n=१९.६ अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती, दिलीप संघवी मागे पडले= मुंबई, [२८ एप्रिल] - रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि प्रख्यात उद्योगपती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%AC.html", "date_download": "2018-08-18T11:11:16Z", "digest": "sha1:RVPO5S2A2NNRN3LSILTZMRMHYVEBOC6Y", "length": 27162, "nlines": 294, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | दिल्ली कॉंग्रेसमध्ये गटबाजी उफाळली", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » दिल्ली कॉंग्रेसमध्ये गटबाजी उफाळली\nदिल्ली कॉंग्रेसमध्ये गटबाजी उफाळली\n=शीला दीक्षित-अजय माकन यांच्यात जुंपली=\nनवी दिल्ली, [१४ जानेवारी] – दिल्ली विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वीच कॉंग्रेस पक्षात अंतर्गत गटबाजी उफाळून आली असून, ज्येष्ठ नेत्या व माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि कॉंग्रेस सरचिटणीस व विधानसभा निवडणुकीसाठी गठित प्रचार समितीचे प्रमुख अजय माकन यांनी एकमेकांवर जाहीरपणे आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत.त्यामुळे गेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत तिसर्‍या स्थानावर राहिलेल्या कॉंग्रेसचे या निवडणुकीतील भवितव्यही आणखी अंध:कारमय होण्याची शक्यता बळावली आहे.\nकधीकाळी सोनिया गांधी यांच्या निकटवर्ती असलेल्या आणि तब्बल १५ वर्षे दिल्लीचे मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या शीला दीक्षित यांचे पक्षश्रेष्ठींशी आता पाहिजे तेवढे सौहार्दपूर्ण संबंध राहिलेले नाही. कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर दिल्लीत कॉंग्रेस आम आदमी पार्टीला पाठिंबा देईल, अशी घोषणा करून शीला दीक्षित यांनी आधीच अडचणीत असलेल्या कॉंग्रेसच्या अडचणींमध्ये आणखी भर टाकली. त्यामुळे त्यांना कॉंग्रेसश्रेष्ठींच्याही नाराजीचा सामना त्यांना करावा लागला. शीला दीक्षित यांच्या या विधानापासून कॉंग्रेसने स्वत:ला दूर ठेवले. एवढेच नव्हे तर दीक्षित यांना या निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा निर्णयही कॉंग्रेसश्रेष्ठींनी घेतला. उमेदवारीपासून शीला दीक्षित यांच्या समर्थकांना वंचित ठेवण्यात आले.\nमात्र, यानंतरही शीला दीक्षित यांच्या वागणुकीत सुधारणा झाली नाही. अजय माकन यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा अनाहूत सल्ला देत शीला दीक्षित यांनी पुन्हा खळबळ उडवून दिली. नवी दिल्ली हा आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचा मतदारसंघ आहे. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात शीला दीक्षित यांचा सामना अरविंद केजरीवाल यांच्याशी झाला. सलग तीनवेळा दिल्लीचे मुख्यमंत्रिपद भूषवणार्‍या शीला दीक्षित यांना केजरीवालांकडून दारुण पराभव पत्करावा लागला. या पराभवाने शीला दीक्षित यांची राजकीय कारकीर्द जवळपास संपली. नाही म्हणायला संपुआ सरकारने त्यांना केरळचे राज्यपाल म्हणून पाठवले. मात्र, केंद्रात नवे सरकार आल्यानंतर त्यांना राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा लागला.\nया निवडणुकीत कॉंग्रेसला मदत करण्याऐवजी शीला दीक्षित यांनी आपल्या विधानाने अडचणीत आणण्याची भूमिका घेतली. त्यामुळे कॉंग्रेसने दीक्षित यांचे पक्षांतर्गत विरोधक अजय माकन यांना विधानसभा निवडणुकीसाठी कॉँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख म्हणून नियुक्त केले. एकप्रकारे अजय माकन यांच्या नेतृत्वात दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला. त्यामुळे अजय माकन यांना अडचणीत आणण्यासाठी शीला दीक्षित यांनी माकन यांना नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची सूचना केली. मात्र, सदर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची माकन यांची इच्छा आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक लढवली तर माकन आपल्यासारखेच पराभूत होतील आणि त्यांची राजकीय कारकीर्दही संपेल, अशी या सूचनेमागची शीला दीक्षित यांची भूमिका असू शकते.\nयाबाबत पत्रपरिषदेत विचारले असता माकन यांनी प्रत्येक युगाची सुरुवात होते व अंतही होतो, असे सूचक विधान करत शीला दीक्षित यांचे युग दिल्लीच्या राजकारणातून संपले असल्याचे स्पष्ट केले. दीक्षित या कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत, त्यांनी या वेळी निवडणूक लढण्यास नकार दिला, निवडणुकीच्या राजकारणातून त्या निवृत्त झाल्या, या शब्दात माकन यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. पक्षश्रेष्ठी आता शीला दीक्षित यांच्या बोलण्यावर बंधन आणतात की अनिर्बंध होऊन त्या कॉंग्रेसला आणखी अडचणीत आणतात, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nनद्या जोड प्रकल्प राबविणारच : व्यंकय्या नायडू\nनवी दिल्ली, [१३ जानेवारी] - काहीही झाले तरी भाजपाप्रणीत रालोआचे केंद्र सरकार नद्या जोडणी प्रकल्प राबविणारच, असा निर्धार केंद्रीय मंत्री ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6.html", "date_download": "2018-08-18T11:11:22Z", "digest": "sha1:OGXQEWKEW7PJPXOYE5LPTSFUH3ORRZEG", "length": 27157, "nlines": 297, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | ‘रेनकोट’वरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » ‘रेनकोट’वरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ\n‘रेनकोट’वरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ\n=नरेंद्र मोदी यांच्या माफीची कॉंग्रेसची मागणी,\nनवी दिल्ली, ९ फेब्रुवारी –\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याबाबत केलेल्या रेनकोट विधानावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. या विधानाबद्दल मोदी यांनी माफी मागावी, अशी कॉंग्रेसची मागणी होती. माफी मागितली नाही तर मोदी यांच्यावर बहिष्कार घालण्याची घोषणाही कॉंग्रेसने केली आहे. या मुद्यावरून लोकसभेत कॉंग्रेसने सभात्याग केला, तर राज्यसभेचे कामकाज दोनदा स्थगित करण्यात आले.\nआज राज्यसभेच्या कामकाजाला प्रारंभ होताच माकपाचे सीताराम येचुरी यांनी मोदी यांच्या विधानाचा मुद्दा उपस्थित केला. मोदी यांचे विधान माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचा अवमान करणारे आहे, असा आरोप करत येचुरी यांनी मुद्यावर चर्चेची मागणी केली. कॉंग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनीही या मुद्यावर मोदी यांच्यावर हल्ला चढवला. एका पुस्तकाचा संदर्भ देत मोदी यांनी इंदिरा गांधी यांच्याबद्दल लोकांच्या भावनांना ठेस पोहोचवली, ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे, असे ते म्हणाले. मोदी यांनी ते पुस्तक पटलावर ठेवले नाही, असे शर्मा यांचा दावा होता.\nआपल्यावर होणार्‍या आरोपांना उत्तर देण्याचा पंतप्रधान मोदी यांना पूर्ण अधिकार आहे, याकडे सभागृहाचे नेते आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लक्ष वेधले. या मुद्यावरून कॉंग्रेस सदस्य अतिशय आक्रमक भूमिकेत होते. त्यांनी वेलमध्ये धाव घेत मोदी यांच्या निषेधाच्या घोषणा सुरू केल्या. संतप्त सदस्यांना शांत होण्याचे, आपल्या जागेवर जाण्याचे आवाहन उपाध्यक्ष कुरियन करत होते. मात्र कॉंग्रेस सदस्य ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. कॉंग्रेस सदस्यांच्या घोषणाबाजीमुळे सभागृहात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, त्यामुळे सभागृहाचे कामकाज आधी दुपारी १२ पर्यत आणि नंतर दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. या मुद्यावरून सरकारला घेरण्याची व्यूहरचना कॉंग्रेसने आखली आहे. आज सकाळी राज्यसभेच्या कामकाजाला प्रारंभ होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या दालनात सभागृहातील व्यूहरचना ठरवण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली होती.\nपंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याबाबत केलेल्या विधानावरून आज लोकसभेतही गदारोळ झाला. कॉंग्रेसने या मुद्यावरून मोदी यांच्या माफीची मागणी करत सभात्याग केला. पंतप्रधानांनी माजी पंतप्रधानांबाबत केलेल्या विधानाची माहिती आम्हाला वृत्तपत्रातून मिळाली, अशी विधाने करून त्यांनी माजी पंतप्रधानांचा अवमान केला. संसदीय लोकशाहीत हे योग्य नाही, असे कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खडगे यांनी शून्य तासात हा मुद्दा उपस्थित करतांना म्हटले.\nपंतप्रधानांच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही, मोदी यांची अशी वागणूक योग्य नाही. माजी पंतप्रधानांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही, असे सांगत खडगे यांनी मोदी यांच्या माफीची मागणी केली. कॉंग्रेसचे सदस्य या मुद्यावरून वेलमध्ये येत घोषणा देऊ लागले. दुसर्‍या सभागृहात झालेला मुद्दा या सभागृहात उपस्थित करण्याची अनुमती देता येत नाही, असे सभापती सुमित्रा महाजन यांनी स्पष्ट केले. संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी महाजन यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवली. दोन दिवसांपासून सभागृहात शून्य तास होऊ शकला नाही, आजही तुम्ही गोंधळ घालून अन्य सदस्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करत असल्याचा आरोप महाजन यांनी केला. विशेष म्हणजे सोनिया गांधी यावेळी सभागृहात उपस्थित होत्या. खडगे यांना काही सूचना देतांना त्या दिसत होत्या. सभापतींच्या भूमिकेच्या विरोधात कॉंग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nकॉंग्रेसनेच आत्मपरीक्षण करावे : रविशंकर प्रसाद\n►अनेक पंतप्रधानांचा अपमान केला, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, ९ फेब्रुवारी - माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचा अपमान करण्यात आला, असा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.tarunbharat.com/news/600465", "date_download": "2018-08-18T10:26:32Z", "digest": "sha1:3USJC63EP6WG4RRCTCVYJDB46KGUI27Y", "length": 5591, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गडहिंग्लजला घर कोसळल्याने लाखाचे नुकसान - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गडहिंग्लजला घर कोसळल्याने लाखाचे नुकसान\nगडहिंग्लजला घर कोसळल्याने लाखाचे नुकसान\nगडहिंग्लज : येथील काशव्वा बिलावर यांचे कोसळलेले घर.\nगडहिंग्लज शहरासह परिसरात दुपारपासून पावसाने जोर धरला आहे. गुरूवारी दुपारी शहरातील बिलावर वसाहतीत घर कोसळून लाखाचे नुकसान झाले आहे. जोराच्या पावसामुळे हिरण्यकेशीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.\nशहरातील बिलावर वसाहतीत रहाणाऱया काशव्वा शंकर बिलावर यांचे रहाते घर कोसळले आहे. यात घरासह संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. काशव्वा या एकटय़ाच घरी रहात होत्या. काशव्वा या हसूरचंपू येथील नातेवाईकांकडे गेल्यामुळे कोणतीही हानी झाली नाही. घर कोसळल्याने काशव्वा यांचा संसार उघडय़ावर आला असून त्यांची बालाजी युवक मंडळाने रहाण्याची सोय केली आहे. तर वसाहतीतील नागरिकांनी अन्य सोय केली आहे. दुपारनंतर गडहिंग्लज परिसरात जोराचा पाऊस असून नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास हिरण्यकेशीवरील ऐनापूर आणि निलजी बंधाऱयावर पुराचे पाणी येण्याची शक्यता तयार झाली आहे. पूर परिस्थितीची पहाणी महसूल अधिकाऱयांनी केली असून नदीकाठच्या गावातील कुटुंबांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.\nआगामी ग्रा. पं. निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे\nअंबाबाईच्या गाभाऱयासोमर संघर्ष समितीचा गोंधळ\nपदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचा मेळावा संपन्न\nजीवनविद्या मिशनतर्फे गुरूपौर्णिमा उत्साहात\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sahajach.com/home/donation.html", "date_download": "2018-08-18T10:11:58Z", "digest": "sha1:Y25FAUXWZSTOTDCPNQBDJCMM525FE65U", "length": 8118, "nlines": 20, "source_domain": "sahajach.com", "title": "Sahajach.com", "raw_content": "आपल्या मित्र-मैत्रीणींना तसेच इतरांना सहजच.कॉमबद्दल कळविण्यासाठी\nइथे खरंच कुणाची मदत करायची\nइथे खरंच कुणाची मदत करायची तयारी आहे का\nअवकाशवेध.कॉम नंतर आता सहजच.कॉम ही वेबसाइट मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी कार्यरत आहे.\nमराठी भाषेसोबत मराठी माणसाची देखिल प्रगती व्हावी याच एका उद्देशाने या दोन वेबसाइटची निर्मिती केली आहे.\nअवकाशवेध.कॉम ही खगोलशास्त्र या आवश्यक व महत्त्वाच्या विज्ञान विषयक वेबसाइट मराठीमध्ये सोप्याभाषेमध्ये सर्वस्थरातील, वर्गातील तसेच वयाच्या मराठी माणसाला ज्ञान पुरविणारी वेबसाइट असून या वेबसाइटला महाराष्ट्र शासनाचे सर्वोत्कृष्ट मराठी वेबसाइटचे प्रथम पारितोषिक देखिल मिळाले आहे.\nसहजच.कॉम या वेबसाइटचा मुख्य उद्देश मराठी माणसाला कॉम्प्युटरमध्ये सुपर एक्सपर्ट बनविणे हा आहे. आपणास कॉम्प्युटरवर काम करता जरी येत असले तरी अनेक आवश्यक गोष्टीची आपणास माहिती नसते. कितीतरी वेळा आपणास इतरांची मदत घ्यावी लागते. अनेक लहान-लहान गोष्टींपासून कितीतरी मोठ-मोठ्या गोष्टी इथे सहज सोप्या भाषेमध्ये शिकविल्या आहेत.\nभविष्यामध्ये अशा अनेक चांगल्या आणि लोकोपयोगी मराठी वेबसाइट बनविण्याच्या कामाला कधीच सुरवात झाली आहे. परंतू जसे आधी 'पोटोबा मग विठोबा' त्याच प्रमाणे एकट्याने किती गोष्टी सांभाळणार. सहजच.कॉम वेबसाइट बनविण्यासाठीच मला दोन वर्षे लागलीत. सर्वसामान्य आर्थिक अडचणींमुळे इतर बाहेरील कामे घेण्याशिवाय पर्याय नाही आणि इतर बाहेरील कामे करताना लोकोपयोगी मराठी वेबसाइट बनविण्याच्या कामाला उशीर होतो. आजपर्यंत बर्‍याच क्षेत्रातील ज्ञान मिळविले हेच ज्ञान लोकांपर्यंत पोहचविण्याचा वेबसाइट हा एक चांगला पर्याय आहे. त्यात सध्या इंटरनेटच्या माध्यमातून मराठीमध्ये ज्ञान प्रबोधनाची तरुणपिढीला फार गरज आहे. यासाठी माहिती पुरविणार्‍या आणि निरनिराळ्या क्षेत्रातील मराठी वेबसाइट बनण्याची फार गरज आहे.\nसध्या अनेक सेवाभावी संस्था समाजकार्य करीत आहेत. इथे अवकाशवेध.कॉम व सहजच.कॉम चालविणारी कुठली संस्था नाही किंवा कुठल्याही आर्थिक मदतीशिवाय या दोन वेबसाइट बनविल्या आहेत. तसेच कुठलीही आर्थिक मदत मिळावी या हेतूने देखिल या दोन वेबसाइटची निर्मिती केली गेली नाही.\nअसे असले तरी ज्या कुणाला या व अशा अनेक चांगल्या आणि लोकोपयोगी मराठी वेबसाइट बनविण्यासाठी आर्थिक मदत करावीशी वाटत असेल त्यांचे स्वागत आहे. तसेच आपल्या आर्थिक मदतीचा वापर योग्य प्रकारे केला जाईल यावर आपण विश्वास ठेवाल अशी अपेक्षा आहे. कारण कुठलीही लेखी हमी देणे म्हणजे मिळणार्‍या मदतीचा व्यवहार करणे असे मला वाटते.\nसहजच.कॉम वेबसाइटवर दिलेली माझी ओळख माझ्याबद्दलची अधिक माहिती देण्यास आपणास उपयोगी पडेल.\nएखाद्या ठिकाणी एखाद्या देवाचे मंदिर बांधण्याची कल्पना प्रथम मंदिराबद्दल सर्वात जास्त आस्था असणार्‍याला सुचते. मग तो ती कल्पना इतरांना सुचवितो. कारण एकट्याने मंदिर बांधणे त्याच्या एकट्याचा अवाक्यात नसते. त्याची कल्पना सहाजिकच इतरांना आवडते. मग सर्वांच्या आर्थिक तसेच शारिरीक मदतीतून एक सुंदर मंदिर निर्माण होते. प्रत्यक्षात मंदिर तयार होण्यापर्यंत बर्‍याच लोकांच्या मदतीचा हातभार त्याला लागलेला असतो. इथे अशाचप्रकारे इंटरनेटच्या माध्यमातून अनेक चांगल्या आणि उपयोगी मराठी वेबसाइट बनवून ज्ञानाचे मंदिर बांधण्याच्या कामाला\nमी एकट्याने सुरुवात केली आहे.\nज्ञान प्रबोधनाच्या प्रकल्पामध्ये आपणास आर्थिक मदत करायची असल्यास संपर्क करा.\nसुचना - सहजच.कॉम वरील माहिती संबंधी\nसहजच.कॉम वरील सर्व हक्क राखिव आहेत. - अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathiinfopedia.co.in/2018/05/", "date_download": "2018-08-18T09:55:35Z", "digest": "sha1:LFBZ356LUMZMHTFMZJHZSSHWANMWCNWG", "length": 71116, "nlines": 331, "source_domain": "marathiinfopedia.co.in", "title": "May 2018 - MARATHI INFOPEDIA", "raw_content": "\nमहात्मा बसवेश्वर (अन्य नावे: बसव,बसवण्णा, कन्नड: ಬಸವೇಶ್ವರ) (इ.स. ११३४ – इ.स. ११६७) हे कर्नाटकातील संत, समाजसुधारक होते. त्यांनी हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेविरुद्ध व अन्य हानिकारक प्रथांविरुद्ध संघर्ष केला. त्यांनी निर्गुण, निराकार एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला.\nत्यांनी इसवी सनाच्या बाराव्या शतकात अहिंसा, सत्य, भूतदया आणि सर्वधर्मसमानता, यासारखे क्रांतिकारक विचार मांडले. हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य पद्धतीला आणि त्यातून जन्मलेल्या जाती पद्धतीला त्यांनी कायम विरोध केला. “कायकवे कैलास” म्हणजे कर्म करण्यातच स्वर्ग आहे हा विचार त्यांनी मांडला. कोणतेही काम कमी प्रतीचे किंवा उच्च प्रतीचे नसते, सर्व मानव समान आहेत. कोणतीही जात श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही असे तत्त्वज्ञान त्यांनी मांडले.\nबसवण्णा शालिवाहन शके दहाव्या शतकात कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी या गावात ११०५ साली प्रतिष्ठित वीरशैव कुटुंबात बसवेश्वरांचा जन्म झाला. काहींच्या मते तो इंगळेश्र्वर (जि. विजापूर) या गावी झाला असावा. त्यांच्या जन्मकाळाविषयी मतभेद असले, तरी सामान्यतः त्यांचा जन्म वैशाखातील अक्षय्य तृतीयेला झाल्याचे मानले जाते. त्यांचे वडील मणिराज ऊर्फ भादरस हे बागेवाडी आगाराचे भांडारप्रमुख होते. त्यांच्या पत्नी मादुलांबा (मादंबा) परम शिवभक्त होत्या. बसवेश्वरांच्या भावाचे नाव देवराज व बहिणीचे नाव नागम्मा होते.त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी मुंजीची तयारी झाल्यावर ‘मला आधीच लिंगदीक्षा मिळाली आहे’ असे म्हणून मुंज करून घ्यायचे नाकारले आणि घर सोडून ते कूडलसंगम (जि. विजापूर) येथे निघून गेले. कृष्णा व मलप्रभा या नद्यांच्या संगमावरील कुडलसंगम येथे मोठे अध्ययन केंद्र होते. तेथे बसवेश्वरांनी बारा वर्षे वास्तव्य केले. कूडलसंगम येथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा, धर्म, तत्त्वज्ञान इत्यादींचा अभ्यास केला. त्यांचा विवाह त्यांच्या मामाच्या मुलीशी झाला. तेव्हा ते सोलापुरातील मंगळवेढा येथे आले. तेथे ते एकतीस वर्षे राहिले.\nबसवण्णांनी मंगळवेढा येथे “लोकशाही संसद म्हणजेच ‘अनुभव मंटपाची’ स्थापना केली. या अनुभव मंटपात सर्व धर्मातील लोक एकत्र येऊन सामाजिक अडचणींवर कशी मात करावी यावर चर्चा करण्याचे कार्य चालत असे. बसवण्णांनी समाजातील रूढीपरंपरा, वाईट चालीरीती यांना विरोध करून समाजाच्या हितकारक गोष्टींची अंमलबजावणी करणारी नवीन यंत्रणा तयार केली.\nलिंगायत धर्म सहिंता – वचन साहित्य\nप्रत्येक धर्माला अधारभूत असे साहित्य असावयास हवे. त्या तत्वाच्या अनुयायींच्यग्मधे फूट पडून अस्तव्यस्त न होता संघटीत होऊन राहण्यास सर्वाना एकासूत्तात बांधणरे साहित्य असावे. खिष्रियन लोकांना बायबल, इस्लामीयांना कुरान असल्याप्रमाणे लिंगायत धर्मास वचन साहित्य हेच आधार साहित्य होय. बसवेश्वरांनी लिहिलेल्या षटस्यल वचनांत लिंगायत धर्माचे संपूर्ण सार सर्वस्व आहे.\nबसवेश्वर आणि त्यांचे सहकारी शरणांची बचने आपल्याला अचार-विचाराबदृल मार्गदर्शन करणरे साहित्य म्हणून प्रत्येक लिंगायताने मानले पाहिजे. नंतर आलेले तोंटद सिध्दलिंगेश्वर षण्मुख स्वामी म्ग्गेय मायीदेव इत्यादींचे बचने बसवादि शरणाच्या वचनावर तात्विक सुत्रवार भाष्य, टीका लिहल्याप्रमाणे आहेत. त्यानंतर निजगुण शिवयोगी, मुप्पिन षडक्षरी, सर्पभूषण शिव्योगी बाल्लीला महंत योगी इ. प्रत्येक शिवयोगींचे साहित्य लिंगायत परंपरेत आहे. याशिवाय बसवादि प्रमथापासुन त्यानंतर होऊन गेलेल्या प्रत्येक शरणांच्या जीवनावर रचलेली पुराणे व काव्य साहित्य आहेत. या सर्व साहित्पाचा अभ्यास केल्यावर असे वाटू लागते की बसवादि शिवशरणांचे बचन साहित्य हे लिंगायत धर्माच्या पाठ्य पुस्तकाप्रमाणे आहे. श्री. सिध्दलिंगेश्वर षणमुख स्वामी,मग्गेय मायीदेव इ वचन साहित्याला प्रथम क्रमांकात प्रमाण ग्रंथ असे म्हणता येईल निजगुण श्विवयोगी, मुप्पीनार्थ, शिवायोगि शिवाचार्य इत्यादिंचे साहित्य व्दीतीय क्रमांकाचे प्रमाण ग्रंथ, हरीहर, राघवंक, चामरस इ.चे पुराण साहित्य तृतीय क्रमांकाचे प्रमाण ग्रंथ आहेत असे म्हणावे लागेल.\nयाप्रकार शरणांच्या वचनांच्या आधारे आचरण आणि विचार करणारेच खरे लिंगायत आहेत असे शिवयोगी सिध्दरामेश्वरांनी आपल्या वचनात म्हटले आहै.\nआमच्या आचरणास आमच्या पूर्व पुरातनांचे सांगणेच इष्ट आहे.\nस्मृती समुद्रात जाऊ घा, श्रुती वैकुंठात राहू घा\nपुराण अग्नीत जाऊ घा, आगम वायूत जाऊ घा\nआमुच्या शरणांचे वचन कपिलसिध्दमल्लिकार्जुन\nमहालिंगाच्या हृदयात ग्रंथित होऊ घा\nआमच्या एका वचनाच्या पारायणास\nव्यत्साचे एक पुराण पारायण होई न सम\nआमचे एकशे आठ वचनांच्या अध्ययनास\nशत रूद्रादि असे न सम\nआमुच्या एक हजार वचनांच्या पारायणास\nगायत्रीचे एक लक्ष जप न होई समान\nकपिलसिद्ध मल्लिकार्जुन (शिवयोगी सिध्दरामेश्वर व. ८५९)\nसोलापूरचे सिध्दरामेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे लिंगायतांज्या आचार व बिचाराला शरणांचे वचनेच अधार शास्त्र होया लिंगायत धर्मानुयायांनी वचनांचे पारायण आणि अध्ययन करावयास हवे. असे अध्ययन केल्यास त्याचे फळ म्हणून स्वतंत्रपणे विचार करण्याची शक्ती प्राप्त होते. सत्यार्थ निर्णय घेताना शास्त्र प्रमाणापेक्षा स्वानुभव प्रमाणाच श्रेष्ठ मानून लिंगायतांनी विश्वास ठेवावा. या कारणे मुढ संप्रदत्यापेक्षा सत्य हेच श्रेष्ठ समजून स्वतंत्रपणे विचार करणाराच खरा लिंगायत होय.\nविस्तारातीत असे तत्व विस्तार\nपाताळातीत तव श्री चरण असे\nब्रम्हांडातीत तव श्री मुकूट असे\nइवलासा झाला देऊनि माझ्या हाता,\nसंपूर्ण विश्रात आत बाहेर व्यापलेला परमात्मा हा विराट रूपी आहे. तो अंतर्यामी ही आहे तसेच अतीतही आहे असा असलेला परमात्मा अगदी छोटासा आकार घेऊन इष्टलिंग रूपाने भक्ताच्या करकमलांत म्हण्जे डाव्या हाताच्या तळ्व्यात येतो हे इष्टलिंग विश्वरूपी महालिंगाचे छोटे रूप, अकार होय. चेतन्यमय परवस्तुपासून सचराचर सृष्टी जेथे प्रकट झाली, जैथे लीला दाखवून, ज्यांत विसर्जन पावतो त्या सत्- चित्- आनंद रूपी परमात्मास लिंगायत प्रक्रीयेत्त ‘लिंग’ म्हणून संबोधिले जाते. अशा या परवस्तूस विश्राचा आकार असलेल्या गोलाकारात लहान रूप देऊन शरीरावर धारण करतो तोच लिंगायत होय. लिंगायतास लिंगवंतही म्हटले जाते. धन असलेला धनवंत, गुणी असलेला गुणवंत, विधा असलेला बिधावंत, श्री असलेला श्रीमंत याप्रमाणे लिंग असलेला लिंगावंत, जो अंगवर लिंग धारण करीत नाही तो लिंगायत नव्हे लिंगायतास वीरशैव, लिंगांगि, लिंगसंगी, जंगम, सिरिजंगम आशाही नावे आहेत.\nया धर्मातील मुख्य महत्वाचा नियम म्ह्णजे इष्टलिंग धारण केल्याने एक व्यक्ती लिंगायत होते जन्मामुळे नव्हे. जन्मत: लिंगायत म्हणवून घेणारा पण इष्टलिंग धारणा न करणरा व्रतहीन आसून समाजापासून बाहेर असलेला होय असे शाणांनी स्पष्टपणे सांगितले आहे. कोणत्याही कारणमुळे लिंगाला काढून ठेवलेला आणि जन्मत: आपण लिंगायत आहोत म्हणून खोटे बोलणात्या बद्दल गुरूबसवेशांनी कठोरपणे टीका केलेली आहे.\nलिंग नसता चालणार, लिंग नसता बोलणारा\nलिंग नसता थुंकी गिळल्यास, केव्हाही किल्मिष्च\nलिंगाशिवाय चालणात्याचे अंग लौकीक स्पर्श करू नये\nलिंगाशिवाय गमन केल्फ़्यास त्याचे चालणे बोलणे\nव्रतहीन कूडल संगमदेव ( ब.ष.व. ६६८ )\nइष्टलिंगासं आपल्या शरीरावर धारण करणे हा अति अवश्यक असा प्रथम नियम आहे. तसे धारण करणरा तोच लिंगायत होय.\nष्टलिंग धारण करणे हा मुख्य नियम आहे है जाणून घेतले. पण ते इष्टलिंग प्रत्येक व्यक्तीने गुरूकडून मंत्रोपदेशासह स्वीकार करावयास हवे आपले आपण शरीरावर लिंग धारण करणारा तो सामाजिक अर्थाने लिंगायत होऊ शकतो. पण धार्मिक आणि आध्यात्मिक स्वरूपात लिंगायत होण्यास गुरूकडूनच इष्टलिंग ध्यावे लागते. ’नेणत्या मानवाला जाणाता शरण’ होण्यास त्यास संस्काराची आवश्यकता आहे. धर्म जन्माने येत नाहीं तर संस्काराने येतो. म. बसवेशांचे भाचे चन्नबसव म्हण्तात\nअसा वीराचार दृढ केल्याशिवाय\nवीरवंशात जन्म घेतला म्हणून वीरशैव होणे नाही\nकूडल चन्नसंगमदेवा (च.ब.व. ११५)\nवैधकीय परीक्षा देऊन पास झाल्याशिवाय केवल वैद्याचा मुलगा म्हणून त्या मुलास वैद्य म्हणणे जसे हास्यास्पद ठरते तदूवत संस्काराशिवाय नुसते जमाने लिंगायत होणे हास्यास्पद होय म्हणून चन्नबसव म्हणतात\nभक्ताज्या पोटी जन्म घेणारा तो भक्त होणे नाहीं\nगुरूच्या कृपेने लिंगधारण केल्याशिवाय भक्त होणे नाही\nत्यांना भक्त म्हणून वाग्विल्यास, म्हणावे लागेल भक्तीहीन\nकुंडल चन्नसंगम देवाचे हेच बचन (च.ब.व. ४२४)\nम्हणून जन्मत: सर्व मानव या धर्मात भवी असता, नंतर गुरूंच्या कृपेने तो भक्त शरण बनतो.\nलिंग संस्कारात दोन प्रकार आहेत. प्रथम लिंगधरणा, नंतर लिंगदीक्षा, स्त्री गर्भवती असताना सातव्या अगर आठव्या महिन्यातच गर्भातील बाळाकरिता मंत्रोपदेश देणे आवश्यक आहे.\nमातेच्या आहार विहाराचा परिणाम बाळावर होत असल्याकारणाने अध्यात्मिक संस्काराचा परिणाम त्या बाळावर होत असतो. हा संस्वार स्त्री गरोदर असताना झला नाही तर बाळंतपण झाल्याबरोबर बाळाला लिंगधारणा करावी.\nजन्मलेल्या शिशुस लिंगधारणा न करता\nयातेचे स्तनपान, म्ध न देणे हाच वीसावा आचारअ\nअसे चन्नबसवेशांचे दुसरे वचन आहे ( च. ब. व. ११२)\nशिवभक्ताचे शिशु भूमीवर पडल्याबरोबर\nविभूती लावून गळ्यात लिंग्धारणा करून,\nपादोदकाने स्थान घालून, प्रसादाचे दूध, लोणी याने न्हाऊ घालून\nपोषण करणे, हाच आचार. दूसरी भूत शांती करणे नाही (च.ब.व. ३९९)\nमूल जन्मल्याबरोबर संस्कार करणे झाले नाही तर अकराव्या दिवशी तरी हा संस्कार व्हावयास हवा.\nदुसरा संस्कार म्हाणजे लिंगदीक्षा. मुलगी असो वा मुलगा कोणताही भेदभाव न करता त्यना गुरूकडून अनुग्रह धावा बालकास समजू लागल्यावर तो स्वत: पूजा करण्यासाठी त्याचे वय बारा तेरा वर्षाचे तरी व्हावयास हवे.\nया वयात त्याला लिंग्दीक्षा करवावे. दीक्षेशिवाय मोक्ष नही (च.ब.व.४६,११५)बीक्षा घेणे हे आद्यकर्तव्य होया लिंगधारणा हा ’वाङूनिश्च्य’ कार्याप्रमाणे तर ‘लिंगदीक्षा’ हे लग्नकार्याप्रमाणे आहे. केवळ वधु वर ठरविणे हे कार्य म्हणजे ’वाङूनिश्च्य’ होय.\nपण त्यांना सामाजिकरित्या जोडीने राहण्यास परवानगी नसते. याचप्रमाणे हा लिंगदीक्षेमुळे ही व्यक्ती याच धर्माचा अनुयायी म्हणून ओळखला जातो. आपण स्वत: लिंगपूजा करून त्याचा आनंद मिळविण्यास लिंगदीक्षा घेणे जरूरीचे आहे. निश्चय कार्याच्या वेळी (मुलामुलीचे) अईवडील आपल्य मुलामुलीला दिल्याधेताल्याचे ठरवितात पण लग्रात स्वत: वधूवरच समोरा समोरच येऊन वैवाहीक जीवनात एकरूप होतात. तसेच लिंगधारणेच्य वेळी आईवडील मुलाच्याव्तीने प्रतिज्ञा करतात. तर लिंगदीक्षेच्या वेळी स्वत: परिक्कता साधलेली व्यक्तीच प्रतिज्ञाबद्ध होते. आपला विश्वास आचरण व्यक्तीश: सामालिकरित्या लिंगदीक्षेच्या वेळी ती व्यक्ती घोषणा करते.\nआपल्या आईवडिलंनी घेतलेल्या प्रतिज्ञेल ती स्थीर बनवते.\nलिंग्दीक्षेला तात्विक,योगिक, मनोशास्त्रीय सामाजीक अर्थसंपत्ती आहे. सर्व लींगायतानी वायाच्या चौदा पंधराव्या वर्षी सद्गुरूकडून या सात्यांचा लाभ ध्यावयास हवा. लिंगदीक्षा म्हणजे गुरूकरणेचा लाभ मिळविणे आणि लिंगांग संबंधी होणे होया.\n“दीयते लिंग संबंध: क्षीयतेच मलत्रया दीयते क्षीयते यस्मात् सा दीक्षेति निगधते दीयते क्षीयते यस्मात् सा दीक्षेति निगधते” मग्गेय मायीदेव-(शिवानुभव परिच्छेद-१५-२८)\nरुथूल, सुक्ष्म, कारण या तनुत्रयात असलेला कार्मिक, माया, अणव मलत्रयांचा नाश करून इष्ट, प्राण,भाव लिंग्त्रयांचा, क्रीया, मंत्र, वेधदीक्षात्रय घेऊन लिंगांग सामरस्याच्या मार्गावर चालण्यास लावणारा धार्मीक संस्कग्रर म्हणजेच दीक्षा होया. अशी दीक्षा धेतल्यावरच आपण परमात्म्याच्य मार्गाकडे वळलो अशी भावना त्या व्यक्तीत स्थिर होते. धर्मगुरूँची तत्वे आपाल्या आचरणात आणण्याची कबूली दिल्याप्रमाणे होते. आपण एक विशिष्ट आचार, विचार असणात्या समाजाचे एक अंग, एक घटक असल्याचे दाखविल्या सारखे होते.\nलिंगायत धर्म: मुख्य तत्वे\nवेदशास्त्र, होम-हवन, मूर्तिपूजा नाकारून बसवण्णांनी ‘लिंगायत धर्म’ स्थापन केला. मानव सर्व एकच आहोत हे सांगताना बसवण्णा आपल्या वचनात म्हणतात (वचन कन्नड भाषेत) : –\n“इवनारव, इवनारव, इवनारवनेंदनिसदिरयया इस नम्मव,\nइव नम्मव, नम्मवनेंदनिसयया, कुडलसंगमदेवा, निम्म मनेय मगनैदानिय्या.” वरील वचन मराठीत :-\nहा कोणाचा, हा कोणाचा, हा कोणाचा ऐसे नच म्हणवावे;\nहा आमुचा, हा आमुचा, हा आमुचा ऐसेचि वदवावे.\nकुडलसंगमदेवा, तुमचा घरचा पुत्र म्हणवावे.\n‘वेद शास्त्र धर्म जे काही सांगतील मी त्यांना मानणार नाही.’ आपल्या वचनात बसवण्णा म्हणतात,\n“वेदक्के ओरेय कट्टवे,शास्त्रक्के निगळवनिक्कु वे,\nतर्कद बेन्न बारनेत्तुव, आगमद मूग कोयिवे, नोडखा,\nमहादानी कुडलसंगमदेवा, मादार चेन्नय्यन, मनेय मग नामय्या.”\nवेदावर खडग प्रहार करेन\nतर्कशास्त्राच्या पाठीवर आसूड ओढेन\nमातंग चेन्नयाचा प्रिय आहे मी,\nमंदिर म्हणजे बहुजनाचे अंधश्रद्धा व भोळी मनोवृत्तीचे केंद्र आहे. म्हणून बसवण्णांनी आपल्या अनुयायांना मंदिर न बांधण्याचा आदेश दिला आहे. आपल्या देहालाच देवालय माना. देवालयापेक्षा देहालय श्रेष्ठ आहे.अशी शुद्ध विचारसरणी बसवण्णांची होती.\nबसवगुरूंचे नाव जाणे ना कोण या जगी नाश होने ना बोलुनी खोटे लिंगायतांचा कर्ता बसवण्णांच जाणा सर्वज्ञ.\nलिंगायत स्वतंत्र धर्म आहे. तो अन्य कोणत्याही धर्माची जात, उपजात, शाखा अथवा पंथ नव्हे. बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन धर्माला ज्या वैशिष्ट्यामुळे स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळाली ती सर्व वैशिष्ट्य लिंगायत धर्म पूर्ण करतो. म्हणून तो एक स्वतंत्र धर्म आहे. स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळविण्यासाठी धर्मगुरु, धर्मसंहिता, धर्मचिन्ह,धर्माचे नाव,धर्मक्षेत्र, धार्मिक केंद्र, धर्मसंस्कार, धार्मिक विधी, धर्माचा ध्वज, धर्माचे ध्येय इ. लक्षणे असावी लागतात. ती लिंगायत धर्मात आहेत. म्हणून तो स्वतंत्र धर्म आहे.\nधर्मगुरु:- विश्वगुरु महात्मा बसवण्णा.\nधर्मग्रंथ:- समानता पटवून देणारे वचन साहित्य.\nधर्मचिन्ह:-सुष्टीकर्ता, समतेचे प्रतिक असणारे इष्टलिंग.\nधर्मक्षेत्र:- बसवण्णांचे ऐक्य क्षेत्र कुडलसंगम, शरण भूमी बसवकल्याण, उळवी, बसवन-बागेवाडी.\nधार्मिक व्रत:- शरण व्रत.\nधर्मतत्वे:- अष्टावरण, पंचाचार, षटस्थल.\nधर्माचा ध्वज:- इष्टलिंग असणारे षटस्थल ध्वज.\nधर्माचे ध्येय:- जात , वर्ग, वर्णरहित धर्मसहित कल्याण राज्य निर्माण करणे.\nधार्मिक सण आणि उत्सव:- बसवादी शरणांचे स्मृती उत्सव\nधर्मानुयायी:- शरण: कोटींच्या संख्येत आहेत.\nचातुर्वर्ण्य व कर्मकांड विषयक विचार\nवर्ण धर्माला वेडाचार ठरवतांना बसवण्णा म्हणतात,\nचांभार उत्तम तो दुर्वास\nकश्यप लोहार, कौंडिण्य तो न्हावी\nतिन्ही लोकी बरवी प्रसिद्धी ती\nजातीचे श्रेष्ठत्व हाची वेडाचार.\nभस्म, गंध टिळा लावून काय उपयोग आहे, मणी गळ्यात बांधून काय उपयोग आहे जर तुमच्यात शुद्ध अंतरंग नसेल, मनाची शुद्धता नसेल हे सर्व देखावा आहे. लोक, ज्या गोष्टी आपल्या आचरणात येणे कठीण आहे त्याच गोष्टीच्या बाह्य अवडंबराने स्वतः शुद्ध मनाचे आहोत असा खोटा आव आणतात. जे देवाला दूध, लोणी, तूप अर्पण करतात ते अंधभक्त होत. त्या संदर्भात बसवण्णा म्हणतात,\nदुग्ध ते उच्छिट तथा वासराचे\nपाणी ते मत्स्याचे उच्छिष्टची\nपुष्प ते उच्छिट तथा भ्रमराचे\nसाधन पूजेचे काय सांगा \nदूध हे वासराचे उष्ट असते, पाणी माशांचे उष्ट असते, पुष्प भ्रमराचे उष्ट असते असे वापरलेले अस्वच्छ उष्ट साधने देवाच्या पूजेचे साधन होऊ शकते का अशाप्रकारे बसवण्णांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीयता, बळी प्रथा, व्रतवैकल्य, उपास-तापास इत्यादींवर प्रखर हल्ला केला आहे. वीरशैव विचारधारा ही लिंगायतांना धार्मिक, मानसिक आणि सांस्कृतिक गुलाम करण्याचे षड्यंत्र आहे. आज लिंगायत विरुद्ध वीरशैव असा भेद निर्माण झाला आहे. वीरशैव हे सनातन धर्माचे कट्टर पुरस्कर्ते आहेत. वर्णधर्म त्यांना मान्य आहे, ब्राह्मण व्रतवैकल्ये मान्य आहेत. वीरशैव विचारधारेचा प्रमुख ग्रंथ सिंद्धान्त ’शिखामणी’ हा वर्णाश्रम धर्मावर आधारित असल्याचे कारण हा ग्रंथ आगम, निगम, शैवपुराण, वेद शास्त्र इत्यादींच्या मूळ स्रोतांशी बांधलेला आहे. बसवण्णा एका वचनात म्हणतात : –\nदगडाचा देव देव नव्हे\nमातीचा देव देव नव्हे\nआज परिस्थिति अशी आहे की लिंगायत धर्माचा मूळ उद्देश आणि बसवण्णांची शिकवण काय आहे हे लोकांना माहीत नाही. लिंगायत हे पूर्णपणे ब्राह्मणी वर्चस्वाखाली आहेत. लिंगायत राशीभविष्य पाहतात तेही ब्राह्मणाकडून; लग्नाचे मुहूर्त ब्राह्मणाकडून काढून घेतात; त्यांचे लग्न व अन्य धार्मिक संस्कार ब्राह्मणच करतात. लिंगायत हे बसवण्णांच्या मूळ विचारधारणेपासून दुरावला गेला आहे. त्यांचे ब्राह्मणीकरण केले गेले. लिंगायत हे कर्मकांड, देव, व्रतवैकल्य, भविष्यवाणी, यज्ञ, अंधश्रद्धा, आत्मा अशा चाकोरीत गुंतलेले आहेत. त्यामुळे लोकांना वाटते की ते ब्राह्मण आहेत. असाच प्रचार व प्रसार करून ब्राह्मणवादी लोक यशस्वी झाले आणि लिंगायतांना ब्राह्मणी धर्माच्या अधीन बनवले. संत बसवण्णांनी आयुष्यभर भटशाहीतून मुक्त करण्यासाठी अनुभव मंटपाची स्थापना केली. त्यातून साहित्य निर्माण केले. वेद, पुराण, स्वर्ग, देव देवता, आत्मा, पुनर्जन्म, यज्ञ, वैकल्य ही थोतांडे नाकारली आणि ७७० परगड जातीतील लोकांना सोबत घेऊन लिंगायत धर्माची स्थापना केली.\nबसवण्णा हे नाग लोकांचे दैवत आहे हे पटवून सांगताना अक्कामहादेवी आपल्या वचनात म्हणतात:-\nदेव लोकांचा देव बसवण्णा\nमत्स लोकांचा देव बसवण्णा,\nनाग लोकांचा देव बसवण्णा मेदुगिरि मंदागिरीचा देव बसवण्णा\n तव शरणांचा देव बसवण्णा\nसाईबाबा (इ.स. १८५६ – १५ ऑक्टोबर, १९१८) एक भारतीय हिंदू संत होते. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी ह्या गांवात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना ‘शिर्डीचे साईबाबा’ म्हणूनही ओळखले जाते. येथूनच बाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे शिर्डी हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.\nसाईबाबा हे मोमीन वंशीय मुस्लिम होते असेही मानण्यात येते. जेव्हा पहिल्यांदा त्यांना म्हाळसा पतींनी() पाहिले तेव्हा साई अशी हाक मारली कारण त्यावेळी मराठी-उर्दू-फारशी मिश्रित भाषा लोक वापरीत असत, साई चा अर्थ ‘फकीर’ किंवा ‘यवनी संत’ असा आहे. साईबाबांसाठी हिंदू मुस्लांसह सर्व लोक समान होते. त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली. “सबका मालिक एक” हे साईंचे बोल होते.\n१५ ऑक्टोबर १९१८ रोजी दसर्‍याच्या दिवशी साईबाबांचे शिर्डीतच निधन झाले.\nसाईबाबांनी भिक्षा मागून उदरनिर्वाह केला. आयुष्यभर त्यांनी सबका मलिक एक हाच उपदेश केला. ते नेहमी अल्लाह मलिक असेही म्हणायचे.\nसाईबाबांचे भक्त भारतात आणि भारताबाहेरही फार मोठ्या प्रमाणात आहेत. ठिकठिकाणी बाबांची मंदिरे उभारण्यात आली आहेत. त्यांच्या भक्तांच्या म्हणण्यानुसार ते अवतारी पुरुष होते. कुणी त्यांना दत्ताचा अवतार मानत तर कुणी विष्णूचा कुणी शिवाचा. बाबांच्या भक्त समुदायात सर्वच जातीधर्मांच्या लोकांचा समावेश होतो. यामध्ये प्रामुख्याने हिंदू व मुस्लिम धर्मीय आहेत. मुस्लिम धर्मातही सुफी संतांमध्ये साई बाबांना मानाचे स्थान आहे.\nसाई बाबा आणि स्वामी स्वरूपानंद\nजून २०१४ मध्ये द्वारका आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य असलेले जगद्गुरू स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी मात्र साई बाबांच्या पूजेला आपला विरोध दर्शवला. कारण त्यांच्या मतानुसार साई हे ईश्वर वा अवतार नसून एक सर्वसामान्य मनुष्य होते. त्यानंतर शिर्डी व काही ठिकाणी साई बाबांच्या भक्तांनी शंकराचार्यांच्या विरोधात निदर्शने केली.\nसाईबाबा हे मुस्लिम फकीर नसून ते जन्माने ब्राम्हण होते, त्यामुळे ते हिंदूच आहेत. असा दावा कांदिवलीच्या साईधाम चॅरिटेबल ट्रस्टने सप्टेंबर २०१४ मध्ये उच्च न्यायालयात दाखल केला होता. त्यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील पाथरी या गावात २७ सप्टेंबर १८३७ रोजी दुपारी सव्वा बारा वाजता झाला, असे त्यांचे म्हणणे आहे. साईबाबांच्या आईवडिलांनी बालपणी त्यांना मुस्लिम फकिराने केलेल्या आग्रहावरून त्यांच्या हवाली केले. पण नंतर त्या फकिराने साईबाबांना वेकुंशा नावाच्या हिंदू गुरूकडे सोपवले. साईबाबा यांचे खरे नाव हरिभाऊ आहे. याबाबत सबळ पुरावे असल्याचा दावाही साईधाम चॅरिटबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आला आहे.मंदिर कळस\nसंत रोहिदास (इ.स. १३७६ – इ.स. १५२७) हे मध्ययुगीन भारतातील हिंदू संत होते. यांच्या गुरूंचे नाव रामानंद स्वामी होते. कबीर यांचे समकालीन होत; तर मीराबाई यांच्या शिष्या होत्या.\nजय रोहिदास मी साळुंके शंकर\nरोहिदासांचा जन्म काशीजवळ गोवर्धनपूर येथे इ.स. १३७६च्या सुमारास झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रघु होते, तर आईचे नाव कालसी होते.\nरोहिदासांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी झाला. त्यांच्या पत्नीचे नाव लोना होते. रोहिदासाच्या भक्तिवेडामुळे धंदा व संसाराचे नुकसान होऊ लागले म्हणून त्याच्या वडिलांनी वडिलोपार्जित संपत्तीचा कुठलाही हिस्सा न देता रोहिदासाला वेगळे काढले. घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत तो झोपडी बांधून पत्नी बरोबर राहू लागला. गुरू रामानंदांच्या संपर्कामुळे रोहिदासाचे ज्ञानभांडार वाढले. तो प्रत्येक विषयावर प्रवचन देऊ लागला आणि आपल्या प्रवचनातून वेद, उपनिषदे आणि दर्शनशास्त्राच्या व्याख्या सांगू लागला.\nसतं रोहिदास प्रसन्न मी साळुंके शंकर\nसंत रोहिदासांचा मृत्यू चितोडगड येथे इ.स. १५२७ मध्ये झाला. चितोडगडातील कुंभश्याम मंदिरात स्वरचित आरती म्हणून ते मंदिराबाहेर पडले, आणि त्याच वेळी संतप्‍त पुरोहितांनी त्यांच्यावर घातक प्रहार करून त्यांचे प्रेत गंभीरी नदीत फेकून दिले असावे. त्यांची पादत्राणे जिथे मिळाली, त्याच ठिकाणी त्यांची समाधी व छत्री बांधलेली आहे\nमूळ नाव माणिक बंडोजी इंगळे\nजन्म एप्रिल 30, १९०९\nसाहित्यरचना ग्रामगीता, अनुभव सागर भजनावली, सेवास्वधर्म, राष्ट्रीय भजनावली\nकार्य अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज – भारतीय टपाल तिकीट\nतुकडोजी महाराज (१९०९-१९६८) यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.\nतुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. त्यांनी त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. “आते है नाथ हमारे” हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.\nभारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही) तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते.\nअमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्‌मयसेवेची पूर्तीच होय. स्वत:ला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ह्याची त्यांना जाणीव होती.\nखेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्‍न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्‍न केले.\nसर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.\nतुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधुसंघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य अखंडव्रतासारखे चालवीत आहेत.\nमहिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.\nदेशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला.\nऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे. त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले. आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्ये कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल. राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते.\nतुकडोजी महाराजांचे महानिर्वाण आश्विन कृष्ण पंचमी शके १८९० (३१ ऑक्टोबर, १९६८) रोजी झाले.\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांच्या प्रसिद्धीचे काम अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाद्वारे केले जाते.\nग्रामगीताहा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या शिवाय हिंदीतून लिहिलेला लहरकी बरखा हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यांचे ग्रामगीता ग्रंथामधील विचार सर्व सामान्यापर्यंत पोहचावे याकरिता महाराष्ट्र शासनाने ग्रामगीता हा ग्रंथ पुनर्मुद्रित करून, सवलतीच्या १० रुपये या किंमतीत उपलब्ध करून दिला आहे.\nतुकडोजी महाराज यांच्या नावाने (१) तुकडोजी महाराज साहित्य संमेलन आणि (२) तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन अशी दोन संमेलने भरतात.\nअनुभव सागर भजनावली (कवी – तुकडोजी महाराज)\nआठवणी (सचित्र) : राष्ट्रसंत जन्मशताब्दीच्या (गंगाधर श्रीखंडे)\nग्रामगीता (कवी – तुकडोजी महाराज)\nडंका तुकाडोजींचा (राजाराम कानतोडे)\nराष्ट्रसंत तुकडोजी (बालसाहित्य, लेखक – प्रा. राजेंद्र मुंढे)\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज (चरित्र, लेखक – डॉ. भास्कर गिरधारी)\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज १०१ मौलिक विचार (संकलन – लेखक – प्रा. राजेंद्र मुंढे). (लोकवाङ्मय प्रकाशन)\nराष्ट्रसंताची अमृतधारा : भाग १, २, ३ (तुकडोजी महाराज)\nराष्ट्रीय भजनावली (कवी – तुकडोजी महाराज)\nसेवास्वधर्म (कवी – तुकडोजी महाराज)\nग्रामगीता या ग्रंथात तुकडोजी महाराज म्हणतात :\nसंत देहाने भिन्न असती परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती\nसाधने जरी नाना दिसती\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुतळा, नागपूर\nसंत तुकडोजी महाराज यांनी अनेक भजने/कविता लिहिल्या. त्यातीलच ही एक :\nराजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली\nती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥\nभूमीवरी पडावे, तार्‍यांकडे पहावे\nप्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥\nपहारे आणि तिजोर्‍या, त्यातूनी होती चोर्‍या\nदारास नाही दोर्‍या, या झोपडीत माझ्या॥३॥\nजाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला\nभिती नं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥\nमहाली मऊ बिछाने, कंदील शामदाने\nआम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥\nयेता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा\nकोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥\nपाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे\nशांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥७॥\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे एक भजन, हे भजन जपान येथे झालेल्या विश्वधर्म परिषदेत म्हटले होते, हे भजन दिल्ली येथील राजघाटा वर नियमीत ऐकविले जाते.\nहर देश में तू …\nहर देश में तू , हर भेष में तू , तेरे नाम अनेक तू एकही है \nतेरी रंगभुमि यह विश्वभरा, सब खेलमें, मेलमें तु ही तो है ॥टेक॥\nसागर से उठा बादल बनके, बादल से फ़टा जल हो कर के \nफ़िर नहर बनी नदियाँ गहरी,तेरे भिन्न प्रकार तू एकही है ॥१॥\nचींटी से भी अणु-परमाणुबना,सब जीव जगत् का रूप लिया \nकहिं पर्वत वृक्ष विशाल बना, सौंदर्य तेरा,तू एकही है ॥२॥\nयह दिव्य दिखाया है जिसने,वह है गुरुदेवकी पूर्ण दया \nतुकड्या कहे कोई न और दिखा, बस मै और तू सब एकही है ॥३॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-18T10:53:43Z", "digest": "sha1:J62F7ZYVALGRDL7GI7UDPJWHKLXAWAK7", "length": 6615, "nlines": 125, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुळा-मुठावर जलपर्णीचे साम्राज्य | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nउरुळी काचंन- शहरातून येत असलेल्या मोठ्या प्रमाणातील दूषित पाण्यामुळे येथील मुळा-मुठा नदीपात्रावर जलपर्णीचे साम्राज्य वाढले आहे. नदीवरील जलपर्णीचा हा विळखा दिवसेंदिवस विस्तारू लागला असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिसरातील गावांच्या आरोग्याला त्यामुळे धोका निर्माण झाला आहे.\nकोरेगाव मूळ आणि अष्टापूर, बिवरी गावांना जोडणाऱ्या मुळा-मुठा नदीवरील पुलाला लागून असलेल्या थेऊरपासून ते भवरापूरपर्यंत नदीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात जलपर्णी विस्तारली असल्याची माहिती पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप यांनी दिली. या जलपर्णीमुळे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत असून, सायंकाळच्या सुमारास येथील पुलावरून प्रवास करताना प्रवाशांना डासांचा सामना करावा लागत असल्याचे अष्टापूरचे शेतकरी अतुल कोतवाल यांनी सांगितले. गावातही मोठ्या प्रमाणात डास निर्मिती झाली आहे. अनेक वेळा या गावांमधील तरुण कार्यकर्त्यांनी यंत्राद्वारे आणि कधी होडीतून जलपर्णी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे पूर्ण निर्मूलन होऊ शकले नाही. ग्रामपंचायत आणि लघुपाटबंधारे खात्याने ही समस्या सोडविण्याबाबत गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“जस्टिस फॉर असिफा’ देहुरोड युथचा कॅन्डल मार्च\nNext articleसोमाटणेमध्ये “बसवाले काकां’ चा वृक्षारोपण संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/mumbai-news-civil-court-permission-uamred-51129", "date_download": "2018-08-18T10:35:00Z", "digest": "sha1:IIFWJJ5WEPDVEFQJWS4ZR2BK6T6Q5QKH", "length": 16809, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news civil court permission in uamred विदर्भातील उमरेड येथे दिवाणी न्यायालयास मान्यता | eSakal", "raw_content": "\nविदर्भातील उमरेड येथे दिवाणी न्यायालयास मान्यता\nगुरुवार, 8 जून 2017\nमुंबई - उमरेड (जि. नागपूर) येथे उमरेड, कुही व भिवापूर या तालुक्‍यांसाठी दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यासह आवश्‍यक 19 पदांची निर्मिती करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे उमरेड, कुही व भिवापूर या तालुक्‍यातील नागरिक आणि पक्षकारांची मोठी सोय होणार आहे.\nमुंबई - उमरेड (जि. नागपूर) येथे उमरेड, कुही व भिवापूर या तालुक्‍यांसाठी दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यासह आवश्‍यक 19 पदांची निर्मिती करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे उमरेड, कुही व भिवापूर या तालुक्‍यातील नागरिक आणि पक्षकारांची मोठी सोय होणार आहे.\nन्यायदान प्रक्रिया अधिक लोकाभिमुख करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांमध्ये नवीन न्यायालयांच्या निर्मितीचा समावेश होतो. त्यामुळे उमरेड येथे नव्याने दिवाणी न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या न्यायालयात नागपूरच्या दिवाणी न्यायालयातील (वरिष्ठ स्तर) 2084 प्रकरणे हस्तांतरित होणार आहेत.\nप्रस्तावित दिवाणी न्यायालयासाठी उच्चस्तर सचिव समितीच्या मान्यतेनुसार 19 पदे निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच पहारेकरी तथा सुरक्षारक्षक व सफाईगार या पदांची कामे बाह्य यंत्रणेद्वारे करून घेण्यात येतील. नवीन न्यायालयाच्या स्थापनेसाठी वार्षिक आवर्ती साडे 92 लाख व अनावर्ती 20 लाख 10 हजार रुपयांच्या खर्चासदेखील मान्यता देण्यात आली.\nराज्याच्या महाअधिवक्तापदी ज्येष्ठ विधिज्ञ आशुतोष कुंभकोणी यांची नियुक्ती करण्याची शिफारस राज्यपालांना करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यापूर्वीचे महाअधिवक्ता रोहित देव यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदावर नियुक्ती झाल्याने हे पद रिक्त आहे. कुंभकोणी यांना वकिली व्यवसायाचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रकरणांत उच्च न्यायालयात शासनाची बाजू प्रभावीपणे मांडली आहे.\nसहायक प्राध्यापक व दंतशल्यचिकित्सकांची पदे नियमित करण्यास मंजुरी\nराज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दंतशास्त्र विभागात तसेच शासकीय दंत महाविद्यालयात सहायक प्राध्यापक व दंतशल्यचिकित्सक या संवर्गांमध्ये तात्पुरत्या नियुक्तीने कार्यरत पात्र उमेदवारांच्या सेवा नियमित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे उच्च पात्रतेचे अनुभवी डॉक्‍टर रुग्णसेवेसह अध्यापनासाठी उपलब्ध होणार आहेत. सेवा नियमित करण्यात आलेल्या पदांमध्ये सहायक प्राध्यापक संवर्गातील तर दंतशल्यचिकित्सक संवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीतील एक विशेष बाब म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. विभागीय निवड मंडळामार्फत तात्पुरत्या सेवेने नियुक्त झालेल्या या उमेदवारांना यापूर्वी केलेल्या तात्पुरत्या सेवेचे कोणतेही आर्थिक लाभ मिळणार नाहीत तसेच शासन निर्णय काढल्याच्या दिनांकापासून अध्यापकांच्या सेवा नियमित होणार आहेत.\nराज्यात सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि शासकीय दंत महाविद्यालये आहेत. शासकीय दंत महाविद्यालय व वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात अध्यापकांच्या पदांचे प्रमाण निश्‍चित करण्यात येते. ही पदे रिक्त राहिली तर मंजूर विद्यार्थी संख्या, महाविद्यालयाची मान्यता यावर विपरित परिणाम होऊ शकतो व रुग्णसेवेतही अडचणी येतात. खासगी वैद्यकीय व्यवसाय आणि खासगी रुग्णालयांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेली स्पर्धा पाहता शासकीय दंतमहाविद्यालयांसमोर अनुभवी, निष्णात डॉक्‍टरांची अध्यापन आणि रुग्णसेवेसाठी कमतरता भासते. या पार्श्वभूमीवर शासन हित जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.\nKerala Floods : केरळमध्ये मदतीसाठी 38 हेलिकॉप्टर, शेकडो बोटी\nकोची : केरळमध्ये यंदाच्या शतकातील सर्वांत मोठी पूर आला असून, पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी तब्बल 38 हेलिकॉप्टर आणि शेकडो बोटी कार्यरत आहेत...\nMaratha Kranti Morcha : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री आंदोलन\nपुणे : मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे सोमवारपासून (ता.20) मराठा आरक्षणासाठी आणि विविध मागण्यांसाठी पुणे विभागीय आयुक्त...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nभाषणात मोठी ताकद आहे.. : बबन साळगांवकर\nसावंतवाडी : भाषणात मोठी ताकद आहे त्याच वक्तृत्वाचा फायदा घेऊन तब्बल 23 दिवसांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे पहिल्यांदा आमदार बनले आणि त्यांनी नंतर...\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://swarjoshi.blogspot.com/2018/08/event-of-aaswad-caterers.html", "date_download": "2018-08-18T10:03:30Z", "digest": "sha1:3WRSPFFYFEQ7CWJLMGL7JQVDY6G2EOAX", "length": 1563, "nlines": 34, "source_domain": "swarjoshi.blogspot.com", "title": "yogesh joshi: Event of Aaswad Caterers", "raw_content": "\nगुरुवार, 9 अगस्त 2018\nप्रस्तुतकर्ता yogesh joshi पर 5:27 am\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nप्रभावी स्तोत्र व मंत्र\nसमाज कार्य हा काही धंदा नाही की राजकारणात जाण्याची शिडी नाही.ज्या समाजात आपण राहातो त्या समजाचे आपण काही देणे लागतो याचे भान ठेऊन आवडीने समाज कार्य करत आहे.\nमेरा पूरा प्रोफ़ाइल देखें\nऑसम इंक. थीम. molotovcoketail के थीम चित्र. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95", "date_download": "2018-08-18T09:56:52Z", "digest": "sha1:2ARHDKZQAUW26HVPGM5EIBKBYWDRL352", "length": 6480, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ताजिक सोव्हियेत समाजवादी प्रजासत्ताक - विकिपीडिया", "raw_content": "ताजिक सोव्हियेत समाजवादी प्रजासत्ताक\nताजिक सोव्हियेत समाजवादी प्रजासत्ताक\n← इ.स. १९२९ – इ.स. १९९१ →\nअधिकृत भाषा ताजिक, रशियन\nक्षेत्रफळ १,४३,१०० चौरस किमी\nताजिक सोव्हियेत समाजवादी प्रजासत्ताक (ताजिक: Республикаи Советии Социалистии Тоҷикистон; रशियन: Таджикская Советская Социалистическая Республика) हे भूतपूर्व सोव्हियेत संघाच्या १५ प्रजासत्ताकांपैकी एक प्रजासत्ताक होते. सोव्हियेत रशियाखालोखाल सोव्हियेत संघातील हे आकाराने दुसर्‍या क्रमांकाचे प्रजासत्ताक होते.\n९ सप्टेंबर, इ.स. १९९१ रोजी सोव्हियेत संघाचे विघटन झाले व ताजिक सोव्हियेत समाजवादी प्रजासत्ताकाचे ताजिकिस्तान देशामध्ये रुपांतर झाले.\nआर्मेनियन एस.एस.आर · अझरबैजान एस.एस.आर · बेलारूशियन एस.एस.आर. · एस्टोनियन एस.एस.आर · जॉर्जियन एस.एस.आर · कझाक एस.एस.आर. · किर्गिझ एस.एस.आर · लात्व्हियन एस.एस.आर · लिथुएनियन एस.एस.आर · मोल्दोव्हियन एस.एस.आर · रशियन एस.एफ.एस.आर. · ताजिक एस.एस.आर. · तुर्कमेन एस.एस.आर. · युक्रेनियन एस.एस.आर · उझबेक एस.एस.आर\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ डिसेंबर २०१५ रोजी १३:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/5327-trailer-of-comedy-film-wagherya-launched", "date_download": "2018-08-18T10:38:00Z", "digest": "sha1:7EQFUMCDFG2XJSBWOER4BQ6VOU7KRXUR", "length": 11488, "nlines": 226, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'वाघेऱ्या' गावात वाघाने घातला धुमाकूळ ! - ट्रेलर लाँच - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'वाघेऱ्या' गावात वाघाने घातला धुमाकूळ \nPrevious Article चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांची १४८ वी जयंती साजरी\nNext Article “सायकल” चित्रपटाच्या टीमचा पुणेकरांशी संवाद\n'लांडगा आला रे आला' ही गोष्ट लहानपणी सर्वानीच ऐकली आहे. लांडगा आला म्हणून कुणीतरी खोडी काढायची आणि मग अख्खे गाव जागे व्हायचे, अशी ती गोष्ट होती. या गोष्टीत थोडा फेरबदल केला आणि लांडग्या एवजी गावात 'वाघ' आला तर काय गोंधळ उडेल अगदी हाच गोंधळ 'वाघेऱ्या' या आगामी सिनेमातील वेड्यांच्या गावात आपल्याला पाहायला मिळणार आहे. गौरमा मीडिया अँड एंटरटेंटमेंट प्रा. लि.चे राहुल शिंदे आणि वसुधा फिल्म प्रोडक्शनचे केतन माडीवाले निर्मित, तसेच 'बॉईज' सारखा सुपरहिट सिनेमा देणारे सुप्रीम मोशन पिक्चर्सचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची प्रस्तुती असलेल्या 'वाघेऱ्या' या आगामी सिनेमाचे नुकतेच ट्रेलर आणि 'उनाड पोरं' या गाण्याचे सादरीकरण करण्यात आले. संपूर्ण स्टारकास्टच्या उपस्थितीत प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यामधून 'वाघे-या' नामक गावातील गमतीजमती प्रेक्षकांना दिसून येतात.\nविनोदी मल्टीस्टार्सचा ‘वाघेऱ्या’ येत्या शुक्रवारपासून १८ मे ला प्रदर्शित\n\"वाघेऱ्या\" मध्ये 'किशोर कदम' दिसणार विनोदी भूमिकेत\n'वाघेऱ्या' च्या प्रमोशनल गाण्याद्वारे अवधुतने पाळले प्रसनजीतला दिलेले वचन - Photos\nगावात 'वाघ' शिरला असल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरते. या बातमीमुळे संपूर्ण गाव वाघाच्या दहशतीखाली येते आणि मग या वाघाला पकडण्यासाठी विविध शक्कला लढवल्या जातात. शिवाय, या सगळ्या गोंधळामुळे स्वत:च्या लग्नाला उभा असलेल्या वनअधिका-याला सुद्धा ताबडतोब वाघेऱ्या गावात पाचारण करावे लागते, त्यामुळे त्याच्या मनाची झालेली घालमेल या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते.\nग्रामीण विनोदाचा वारू चौफेर उधळवणाऱ्या या ट्रेलरबरोबरच, सिनेमाचे दिग्दर्शक समीर आशा पाटील लिखित आणि संगीतकार मयुरेश केळकर दिग्दर्शित 'उनाड पोरं' हे उडत्या चालीचे गाणेदेखील यावेळी प्रदर्शित करण्यात आले. आदर्श शिंदेच्या भारदस्त आवाजातील हे गाणे सिनेरासिकांचे भरघोस मनोरंजन करणारे ठरत आहे.\n'वाघे-या' या सिनेमात ऋषिकेश जोशी, किशोर कदम आणि भारत गणेशपुरे यांची प्रमुख भूमिका असून, सुहास पळशीकर, नंदकिशोर चौघुले, लीना भागवत आणि छाया कदम या मराठीतील दिग्गज कलाकारांच्या कसदार अभिनयाची जुगलबंदीदेखील यात आपल्याला अनुभवता येणार आहे. 'वाघे-या' गावात खरंच वाघ आला होता का की फक्त एक अफवा होती की फक्त एक अफवा होती हे जाणून घेण्यासाठी येत्या १८ मे रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात 'वाघेऱ्या' सिनेमा नक्की पाहायला जा.\nPrevious Article चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांची १४८ वी जयंती साजरी\nNext Article “सायकल” चित्रपटाच्या टीमचा पुणेकरांशी संवाद\n'वाघेऱ्या' गावात वाघाने घातला धुमाकूळ \n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\nतीच धम्माल मस्ती घेऊन पुन्हा येतोय 'बॉईज 2' ५ ऑक्टोबरपासून\n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेमधील हरहुन्नरी लक्ष्मी म्हणजेच अभिनेत्री 'समृद्धी केळकर' झाली \"कथ्थक विशारद\"\n'अमेय वाघ' करणार 'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स' चं सूत्रसंचालन\n\"अंजली स्वीकारणार सईचं आव्हान\" - पहा 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेचा २ तासांचा विशेष भाग १९ ऑगस्टला\nSony Pictures Network चे मराठी मनोरंजन क्षेत्रातले पहिले पाऊल - Sony मराठी\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\nतीच धम्माल मस्ती घेऊन पुन्हा येतोय 'बॉईज 2' ५ ऑक्टोबरपासून\n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेमधील हरहुन्नरी लक्ष्मी म्हणजेच अभिनेत्री 'समृद्धी केळकर' झाली \"कथ्थक विशारद\"\n'अमेय वाघ' करणार 'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स' चं सूत्रसंचालन\n\"अंजली स्वीकारणार सईचं आव्हान\" - पहा 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेचा २ तासांचा विशेष भाग १९ ऑगस्टला\nSony Pictures Network चे मराठी मनोरंजन क्षेत्रातले पहिले पाऊल - Sony मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B2-27-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%86/", "date_download": "2018-08-18T10:54:42Z", "digest": "sha1:WCAC2YK7O32RRK2BY4J6KA7JFK4I3NHM", "length": 10425, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तब्बल 27 वर्षांनंतर ग्रीस आणि मॅकडोनियामधील मिटला वाद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतब्बल 27 वर्षांनंतर ग्रीस आणि मॅकडोनियामधील मिटला वाद\nअथेन्स : ग्रीस आणि मॅकडोनिया या देशांमधील शांततेची बोलणी अखेर तडीस गेली आहेत. सुमारे 27 वर्षांनंतर शांतता प्रस्थापित होण्याची पहिल्यांदाच वेळ आली आहे. मॅकडोनिया हा देश ग्रीसच्या उत्तरेस आहे.\nफॉर्मर युगोस्लाव रिपब्लिक ऑफ मॅकडोनिया हे नाव बदलण्यावर मॅकडोनिया आणि ग्रीस तयार झाले आहेत. या दोन्ही देशांना राजी करण्यासाठी संयुक्त राष्ट्राने अनेकवेळेस मध्यस्थी करुन चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. फॉर्मर युगोस्लाव रिपब्लिक ऑफ मॅकडोनिया हा देश त्याच्या लांबलचक नावातील प्रत्येक शब्दाच्या आद्याक्षरावरुन एफवायआरओएम किंवा मॅकडोनिया नावाने ओळखला जायचा. आता हा देश रिपब्लिक ऑफ नॉर्थ मॅकडोनिया नावाने ओळखला जाईल.\nमॅकडोनिया हे नाव ग्रीसच्या उत्तर प्रांताचे नाव होते. हेच नाव 1991 साली तयार झालेल्या नव्या देशाने घेतल्याने ग्रीक लोक संतप्त झाले होते. हे नाव घेतल्यामुळे आपल्या प्रांतावर उद्या हक्क सांगितला जाईल असे त्यांना वाट होते. इतकेच नव्हे मॅकडोनियातील राजधानीमधील विमानतळाला ग्रीकमधील प्राचीन योद्धा अलेक्झांडर द ग्रेटचे नाव दिल्याने ही परिस्थिती अधिकच चिघळली. मॅकडोनियाला युरोपियन युनियन आणि नाटोमध्ये प्रवेश देण्यास ग्रीसने विरोध केला होता.\nग्रीसचे पंतप्रधान अलेक्सीस त्सायप्रस याबाबत बोलताना म्हणाले, अनेक महिन्यांच्या वाटाघाटीनंतर आम्ही हा प्रश्न सोडवण्यासाठी आमचे मतभेद बाजूला ठेवत आहोत आणि आमच्या शेजारी देशाचे नाव बदलण्यावर एकमत झाले आहे. नावामधील हा बदल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळीकडे करण्यात येणार आहेत. ग्रीसचे पंतप्रधान अलेक्सीस त्सायप्रस आणि मॅकडोनियाचे पंतप्रधान झोरान झाएव बल्गेरियामध्ये युरोपियन युनियनच्या शिखर परिषदेच्या वेळेस भेटले तेव्हा या नव्या बदलाचे संकेत त्यांनी दिले होते. तसेच सोमवारी आणि मंगळवारी या दोन्ही नेत्यांमध्ये फोनवच चर्चा झाली.\nग्रीसच्या पंतप्रधानांनी नाव बदलाच्या कराराची माहिती दिल्यावर झाएव यांनी टीव्हीवरुन मॅकडोनियातील नागरिकांना या कराराची माहिती दिली. त्सायप्रस यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला. हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टेनबर्ग यांनी दोन्ही पंतप्रधानांचे कोतुक केले आहे. शनिवारी प्रेस्पा तलावाच्या काठावर या करारावर स्वाक्षरी होईल.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपिंपरीत अल्पवयीन मुलीवर मंदिरात अत्याचार\nNext articleसौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीचा येमेनच्या बंदरावर हल्ला\nसंयुक्त राष्ट्र संघाचे माजी सचीव कोफी अन्नान यांचे निधन\nपाक व्याप्त कश्मीरच्या राष्ट्रपतींच्या शेजारी बसले सिध्दू, होतोय मोठा वाद\nइस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांची पुन्हा चौकशी\nचीन करु शकतो अमेरिकी तळांवर हवाई हल्ला\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान यांची निवड…\nसदिच्छा दूत म्हणून पाकिस्तानला भेट…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/agrowon-news-due-increase-gst-cost-fertilizers-will-be-high-54658", "date_download": "2018-08-18T10:30:23Z", "digest": "sha1:IPTJ67654PMYWLV7EN26LEE4WUJPNVDQ", "length": 17399, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon news Due to the increase in GST, the cost of fertilizers will be high वाढीव जीएसटीमुळे खतेही महागण्याची चिन्हे | eSakal", "raw_content": "\nवाढीव जीएसटीमुळे खतेही महागण्याची चिन्हे\nशुक्रवार, 23 जून 2017\nशेतकऱ्यांना सोसावी लागणार शंभर रुपयांची दरवाढ\nकोल्हापूर - खत विक्रेत्यांबरोबर शेतकऱ्यांनाही सहा टक्के जीएसटीचा अतिरिक्त भार सोसावा लागणार असल्याने याचा फटका दोन्ही घटकांना बसणार आहे. सहा टक्‍क्यांच्या वाढीव जीएसटीमुळे खताच्या एका पोत्यामागे पन्नास ते शंभर रुपयांपर्यंतचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. अगोदरच मॉन्सून लांबल्याने चिंतेत असणाऱ्या शेतकऱ्यांना या सुलतानी संकटाचा सामना जुलैनंतर करावा लागणार आहे.\nशेतकऱ्यांना सोसावी लागणार शंभर रुपयांची दरवाढ\nकोल्हापूर - खत विक्रेत्यांबरोबर शेतकऱ्यांनाही सहा टक्के जीएसटीचा अतिरिक्त भार सोसावा लागणार असल्याने याचा फटका दोन्ही घटकांना बसणार आहे. सहा टक्‍क्यांच्या वाढीव जीएसटीमुळे खताच्या एका पोत्यामागे पन्नास ते शंभर रुपयांपर्यंतचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. अगोदरच मॉन्सून लांबल्याने चिंतेत असणाऱ्या शेतकऱ्यांना या सुलतानी संकटाचा सामना जुलैनंतर करावा लागणार आहे.\nसध्या खतांवर प्रचलित सहा टक्के कर लागू आहे. जी.एस.टी.नुसार यात सहा टक्के वाढ होणार आहे. खताशिवाय वाहतूक, स्टोअरेज, हमाली यावरही जी.एस.टी. लागणार असल्याने वाढीव रक्कम पोत्यामागे शंभर रुपये इतकी होणार आहे. यामुळे जुलै नंतर खतांचे महाग होणे हे क्रमप्राप्तच बनले आहे.\nस्पष्टता नसल्याने विक्रेते हवालदिल\nशासनाने जीएसटी जाहीर केल्यानंतर खताला बारा टक्के आकारणी केली. शासनाच्या नियमानुसार एक जुलैनंतर जुलैच्या पूर्वीच्या साठ्याची माहिती शासनाला द्यावी लागणार आहे. यानुसार जेवढा शिल्लक साठा असेल त्या साठ्याची अतिरिक्त सहा टक्‍क्यांचा कर शासनाला भरावा लागेल. खताची विक्री तर नाहीच परंतु शिल्लक साठ्याच्या जी.एस.टी. भारही विक्रेत्यांना सोसावा लागणार आहे.\nमॉन्सून लांबल्याने अगोदरच शेतकरी खते घेण्यास टाळाटाळ करीत असल्याने हा भुर्दंड विक्रेत्यांना बसणार हे जवळपास निश्‍चित आहे. जुना साठा डिसेंबर अखेर विक्री करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. पण त्याची विक्री या कालावधीत ही न झाल्यास काय करायचे याचा प्रश्‍न अनुत्तरितच आहे. विक्रेत्यांनी नेमके काय करावे याबाबतच्या सूचना शासन स्तरावर नसल्याने विक्रेत्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.\nनव्या नियमांबाबत काही विक्रेत्यांशी संपर्क साधला असता सध्या व्यवहार करणे अडचणीचे ठरत असल्याचे या विक्रेत्यांनी सांगितले. कुठलेच स्पष्ट आदेश नाहीत. किंवा या क्षेत्रातील व्यक्तींनाही नेमका अंदाज नसल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजी आहे. शेतकऱ्यांना तर महाग दराने खते द्यावीच लागणार आहेत. पण व्यवस्थापन खर्चाचा ताळमेळही घालावा लागणार असल्याने खत विक्रेत्यांमध्ये शिल्लक साठा विक्री, मागणी याबाबतचा अंदाज बांधणे कठीण बनत आहे.\nजास्त फटका ऊस उत्पादकांनाच\nदक्षिण महाराष्ट्रात खत कंपनी, विक्रेत्यांच्या दृष्टीने ऊस हे महत्त्वाचे पीक आहे. इतर पिकांच्या तुलनेत या भागात पन्नास टक्‍क्यांहून अधिक खत हे केवळ उसासाठी वापरले जाते. आणि हे खत वापरण्याचा कालावधी जून ते ऑगस्ट हाच आहे. अद्याप पाऊस नाही यामुळे खत मागणी नाही. जुलैमध्ये पाऊस पडल्यास व अचानक खताची मागणी वाढल्यास नव्या नियमाप्रमाणेच हे व्यवहार होणार असल्याने त्याचा धसका विक्रेत्यांबरोबर शेतकऱ्यांनी घेतला आहे. एकरी पंधरा हजार रुपयांची खतांचे प्रमाण धरल्यास शेतकऱ्याना दीड ते दोन हजार रुपयांचा फटका यामुळे बसणार आहे.\nचलनाच्या अडचणीमुळे व्यवहार थांबलेतच, पण खत उत्पादक कंपन्यांनीही दर कमी करता येतील का याबाबत भाष्य केले नाही. जर कंपन्यांना इतर करांतून सूट मिळत असेल, तर त्यांनी किमती कमी करणे गरजेचे आहे. असे झाले तरच याचा फटका बसणार नाही. अन्यथा ही गोंधळाची स्थिती कायम राहील.\n- निगम शहा, संचालक, वसंतलाल एम. शहा आणि कंपनी सांगली\nशासनाने शेतकऱ्यांबरोबर विक्रेत्याचेही नुकसान होणार नाही या बाबतचे स्पष्ट नियम बनवावेत. भविष्यात नेमके काय करावे लागणार विक्रेत्यांत संभ्रम आहे. शासनाने या संदर्भात तातडीने स्पष्टता करावी\n- अविनाश पाटील, अध्यक्ष, सांगली जिल्हा फर्टिलायझर्स डीलर्स असोसिएशन\nKerala Floods : केरळमध्ये मदतीसाठी 38 हेलिकॉप्टर, शेकडो बोटी\nकोची : केरळमध्ये यंदाच्या शतकातील सर्वांत मोठी पूर आला असून, पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी तब्बल 38 हेलिकॉप्टर आणि शेकडो बोटी कार्यरत आहेत...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nभाषणात मोठी ताकद आहे.. : बबन साळगांवकर\nसावंतवाडी : भाषणात मोठी ताकद आहे त्याच वक्तृत्वाचा फायदा घेऊन तब्बल 23 दिवसांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे पहिल्यांदा आमदार बनले आणि त्यांनी नंतर...\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nसंग्रामपूर : वाण धरण ६५ टक्के भरले\nसंग्रामपूर : सातपुडा पर्वतामधील तीन जिल्ह्यांसाठी जलसंजीवनी ठरलेले वाण धरण 65 टक्के भरले आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nashik-news/tukaram-mundhe-nashik-municipal-corporation-1629409/", "date_download": "2018-08-18T11:13:51Z", "digest": "sha1:XLGCXSSP5OB4FM4GCC3J7JV6LCVZJHH3", "length": 20315, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Tukaram Mundhe Nashik Municipal Corporation | नाशिक पालिकेत मुंढेंचा पहिला धडा शिस्तीचा | Loksatta", "raw_content": "\nबेशिस्त वाहनचालकांना ९१ लाखांचा दंड\nपक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा\nपुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित\nजळगावमध्ये महाजन-खडसे गटबाजीची सर्वत्र बाधा\nएमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल\nनाशिक पालिकेत मुंढेंचा पहिला धडा शिस्तीचा\nनाशिक पालिकेत मुंढेंचा पहिला धडा शिस्तीचा\nआयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारताच धडक कृती\nआयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारताच धडक कृती\nशिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ अशी ओळख असलेले तुकाराम मुंढे यांनी पालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांची विलक्षण धडाडीची कार्यपध्दती दाखवून दिली. शुक्रवारी सकाळी १० च्या ठोक्याला महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार मुंढे यांनी स्वीकारला. विभाग प्रमुखांकडून बैठकीत आढावा घेताना गणवेश, पदनाम चिन्ह आणि टोपी परिधान न केलेल्या अग्निशमन दलाच्या प्रमुखांना बाहेर काढत मुंढे यांनी शिस्त म्हणजे काय, याचा पहिला धडा अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिला.\nशहरातील मिळकती आणि तत्सम बाबींची काहींनी अंदाजे उल्लेख करीत माहिती दिली. अंदाजे या शब्दावर आक्षेप घेत मुंढेंनी अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. तसेच सातही दिवस चोवीस तास आपले काम असून ते संवेदनशीतेने करायला हवे, असे ठणकावले. सत्ताधारी भाजपकडून अधिकारी वर्गावर दबावतंत्राचा अवलंब केला जात असल्याची व्यथा अधिकाऱ्यांनी मांडल्यावर यापुढे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणाचाही दबाव राहणार नसल्याचे स्पष्ट करत चुकीचे काम करणाऱ्यांची हयगय केली जाणार नसल्याचा इशारा दिला.\nसत्ताधारी भाजपच्या दबाव तंत्रामुळे त्रासलेल्या आणि त्यामुळे स्वेच्छा निवृत्तीची मानसिकता बाळगणाऱ्या पालिकेतील काही अधिकाऱ्यांची मुंढे यांच्या आगमनानंतर दुहेरी कात्रीत सापडल्याची भावना झाल्याचे अधोरेखीत झाले. पुणे महानगर परिवहन महामंडळात सर्वपक्षीय नेत्यांशी संघर्ष करत धडाकेबाज कारवाई करणाऱ्या मुंढे यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यामुळे सत्ताधारी भाजपच्या वर्तुळात अस्वस्थता असताना त्यात पालिकेतील अधिकाऱ्यांची भर पडल्याचे पहावयास मिळाले.\nपालिकेच्या कामकाजाची वेळ सकाळी १० ची असली तरी वेळेत कोणी अधिकारी, कर्मचारी येत नाहीत. वरिष्ठ अधिकारी दुपारी चारनंतर येतात. मुंढे यांनी सकाळी १० वाजताच पालिकेत येत वेळेचा शिरस्ता पाळल्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. विभाग प्रमुखांची ओळख आणि आढावा बैठकीसाठी कार्यालयातून दूरध्वनी गेल्यावर सर्वाची धावपळ उडाली. एकामागोमाग एक अधिकारी आयुक्त कार्यालयात धडकू लागले. कार्यालयाबाहेरील पायपुसणीवरील धुळीवर मुंढे यांची नजर गेली. एका नळातील पाणी गळती निदर्शनास आली. पायपुसणीची स्वच्छता, नळ गळती तातडीने बंद करण्याची सूचना त्यांनी केली. साडे दहाच्या सुमारास सुरू झालेली विभागप्रमुखांची बैठक अडीच तास सुरू होती. प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्याची ओळख करून घेताना सद्यस्थिती त्यांनी जाणून घेतली.\nयावेळी मालमत्तेशी संबंधित माहिती देतांना एका अधिकाऱ्याने अंदाजे शब्द वापरला. तेव्हा आपल्याकडे आपल्या विभागाची अंदाजे नव्हे तर ठोस माहिती असायला हवी, असे त्यांनी सुनावल्याचे समजते. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची सद्यस्थिती, कचरा संकलनाची पध्दत आदींबाबत त्यांनी जाणून घेतले. पालिकेचे तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी प्रशासनाला लावलेली शिस्त नंतर काही काळ विस्कळीत झाल्याचे विलंबाने येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे लक्षात येते. शहरातील मूलभूत सुविधांची जबाबदारी सांभाळणाऱ्या पालिकेचे काम चोवीस बाय सात चालते. अधिकाऱ्यांनी त्याची जाणीव ठेवावी. कार्यालयीन वेळेचे पालन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. पालिका प्रशासन चांगले काम करते असे नागरिकांनी म्हणायला पाहिजे. चांगले काम करण्यासाठी प्रयत्न करावा. नियमात जी कामे बसतात ती करण्यासाठी विचार करत बसू नका, असा सल्ला त्यांनी दिल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.\nप्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही\nमहापालिकेची एकहाती सत्ता प्राप्त केल्यावर भाजपच्या काही नेत्यांकडून पालिका अधिकाऱ्यांवर दबाव तंत्राचा अवलंब केला जात असल्याची ओरड आहे. त्यास वैतागून आतापर्यंत आठ ते १० अधिकाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारणे पसंत केले. मुंडे आल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या जाचापासून मुक्तता होईल, अशी अधिकारी वर्गाची भावना आहे. बैठकीत अधिकाऱ्यांनी कोणाचा दबाव नको, अशी भावना मांडली. त्यावेळी मुंढे यांनी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणाचाही दबाव राहणार नसल्याचे स्पष्ट केले. तथापि, चुकीचे काम करणाऱ्यांची हयगय केली जाणार नसल्याचे बजावले.\nनागरिकांना केंद्रबिंदू मानून पालिका प्रशासनाने काम करायला हवे. सर्वसामान्यांचे काम सहजपणे कसे होईल याचा प्राधान्याने विचार करून काम करावे, असे निर्देश दिले. नागरिकांचे अर्ज, ठेकेदार किंवा लोकप्रतिनिधींच्या कामांचे प्रस्ताव, कागदपत्रे यांचा विहित मुदतीत निपटारा होणे गरजेचे आहे. अर्ज, फाईलच्या प्रवासावर पालिकेबाहेरील कोणी नजर ठेवायला नको. ही जबाबदारी अधिकारी, कर्मचाऱ्यांची आहे. बाह्य़व्यक्ती तसे करतांना आढळल्यास संबंधित विभाग प्रमुख किंवा कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई केली जाईल, असा इशाराही मुंढे यांनी दिला.\nबैठकीत मुख्य अग्निशमन अधिकारी अनील महाजन गणवेश, पदनाम चिन्ह आणि टोपी परिधान न करता आले होते. ते लक्षात आल्यावर मुंढे यांनी त्यांना पूर्ण गणवेशात येण्यास बजावले. गणवेशधारी अधिकाऱ्यांनी शिस्तबध्दपणे काम करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. आयुक्तांच्या निर्देशानंतर बैठकीतून बाहेर पडलेले अग्निशमन अधिकारी आपल्या मोटारीत ठेवलेले पदनाम चिन्ह, टोपीसह पूर्ण गणवेशात पुन्हा १० मिनिटात प्रगट झाले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n पिंपरीत पित्याने दोन मुलांची हत्या करुन केली आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nIt's Official: नात्यावर शिक्कामोर्तब करत अखेर निक-प्रियांका म्हणाले....\nसहजीवनाचा पहिला टप्पा सर, थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा\nइम्रान खानच्या शपथविधीला सिद्धूंना मानाचे स्थान, घेतली लष्करप्रमुखांची गळाभेट\nमिनी एसयुव्हीसारखं डिझाईन असलेली नवीन रेनाँ क्विड वसूल करते तुमचा पै न पै\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nअंतर्गत वाहतुकीसाठी ट्रामचा पर्याय\nवाहनांना एक टोल माफ\nरेल्वेचे संगणकीय आरक्षण केंद्र पावणेतीन तास बंद राहणार\nस्वानंद देणारे शिक्षण निवडा\nवामनदादा कर्डकांना शाहिरीतून अभिवादन\nभूगावमधील हॉटेलमध्ये कोंबडय़ांच्या झुंजीवर जुगार\nपाणी पुरेना आणि म्हणे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tarunbharat.com/news/523849", "date_download": "2018-08-18T10:25:34Z", "digest": "sha1:HK3ZWTXGH5SMYUULUOW6CQ7AEPNZWYUB", "length": 6428, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "खुली निवडणूक घेतली नाही तर बहिष्कार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » खुली निवडणूक घेतली नाही तर बहिष्कार\nखुली निवडणूक घेतली नाही तर बहिष्कार\nगोवा विद्यापिठामध्ये 16 रोजी होणाऱया निवडणूका खुल्या घेण्यात याव्या व सगळय़ा विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी एनएसयूआयने गेला महिनाभर विद्यापिठाचे कुलगुरु व राज्यपालांकडे मागणी केली तरी अजून यावर त्यांनी काही प्रतिक्रीय दिली नसल्याने आता एनएसयुआयच्या विद्यार्थ्यांनी या मतदनाला बहिष्कार घालण्याचे ठरविले आहे, असे यावेळी एनएसयूआयचे अध्यक्ष एहराझ मुल्ला यांनी पत्रकर परिषदेत सांगितले.\nगेल्या वर्षी या विद्यार्थी परिषदेच्या निवडणूकीमध्ये मतदारांना धमकाविण्याच्या लाच देण्याच्या घटना घडल्या होत्या, काही जणांना मारहाण केली होती. या विषयी विद्यापिठाच्या कुलगुरुंना तसेच राज्यपालांना माहिती दिली होती पण अजून त्यांवर काहीच कारवाई झालेली नाही. या वर्षी पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी गोवा विद्यापिठाच्या निवडणूका खुल्या घेण्यात याव्या यासाठी एनएसयुआयने राज्यपालांकडे मागणी केली आहे. राज्यपाल व विद्यापिठाचे कुलगुरु भाजप सरकारच्या विरोधात होणार असल्याने हा निर्णय घेते नाही, असा आरोप यावेळी मुल्ला यांनी केला.\nगोवा विद्यापिठाच्या या निवडणूकामध्ये गोव्यातील कॉलेजमधील काही मोजक्या विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क असतो त्यामुळे सत्ताधाऱयांकडून त्यांना धमकाविले जाते त्यांचे अपहरण केले जाते असे प्रकार या वर्षी घडू नये यासाठी निवडणूका खूल्या घ्यावा व राज्यातील सर्व विद्यार्थ्यान मतदान करण्याचा हक्क मिळावा यासाठी ही मागणी केली जात आहे, असे यावेळी नितीन पाटकर यांनी सांगितले.\nगोव्यातील धार्मिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करू नये\n‘उन्हाचे घुमट खांद्यावर’ एक मोरपीस\nम्हादईचे पाणी वळविता येणार नाही, मात्र वाटप अटळ\nबेकायदा खाणींमुळे झालेल्या नुकसानीच्या वसुलीची प्रक्रिया सुरू\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/600275", "date_download": "2018-08-18T10:24:44Z", "digest": "sha1:WBI46SEIQS47Y3U72C6O7755AGZ44QBT", "length": 6679, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कराडात सात हॉटेलवर कारवाईचा बडगा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » कराडात सात हॉटेलवर कारवाईचा बडगा\nकराडात सात हॉटेलवर कारवाईचा बडगा\nशहरासह परिसरात रात्री वेळेची मर्यादा न पाळता हॉटेल सुरू ठेवल्याने पोलिसांनी सात हॉटेलवर कारवाई केली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचा कार्यभार स्वीकारताच रात्रगस्तीवर असणाऱया सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांच्या मोहिमेने हॉटेल चालकांची पंचाईत झाली. हॉटेल चालकांनी वेळेची मर्यादा न पाळल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.\nकराड, मलकापूर, सैदापुरात हॉटेल, परमीट रूम बिअर बारची संख्या मोठी आहे. शहरात पूर्वी रात्री खून, मारामाऱया, खंडणी उकळणे, लुटमारीच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रात्री साडेदहा ते अकरानंतर हॉटेल, पानटपऱयांसह बिअर बार सुरू न ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांकडून वारंवार कारवाई करण्यात येत होती. मध्यंतरीच्या काळात हॉटेल, बिअर बारवरील कारवाईत खंड पडल्याने बऱयाच हॉटेल, बिअर चालकांनी आपली स्वतःची वेळ निश्चित केली होती. यातील अनेक हॉटेल, बिअरबार चालकांना राजाश्रय असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नव्हती अशीही चर्चा होती. दरम्यान, पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी नियम न पाळणाऱयांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी मंगळवारी रात्री वेळेचे बंधन न पाळणाऱया हॉटेल, बिअर बारवर कारवाई केली. एकूण सात हॉटेल, बिअरबारवर कारवाई केली आहे. शहरासह परिसरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी यापुढेही कारवाईची मोहीम सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nपाणी पुरवठा सभापती 24 बाय सात तास सातारकरांच्या सेवेत\nट्रकचे कारण पुढे करुन वाहनचालकांना त्रास दिल्यास याद राखा\nउपनिबंधक प्रकाश अष्टेकरांचा जिल्हा सहकारी बँकेतर्फे सत्कार\nमराठा आंदोलनातील मृतावर तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AF%E0%A5%AD", "date_download": "2018-08-18T09:56:44Z", "digest": "sha1:CNUMR3VZZRZXHCN55NKWOPT3GIRVGQ4H", "length": 9657, "nlines": 262, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १८९७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १८७० चे - १८८० चे - १८९० चे - १९०० चे - १९१० चे\nवर्षे: १८९४ - १८९५ - १८९६ - १८९७ - १८९८ - १८९९ - १९००\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी २३ - नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म भारताच्या ओडिशा राज्यातील कटक शहरात झाला.\nफेब्रुवारी २ - अमेरिकेत पेनसिल्व्हेनियाचा विधानसभा आगीच्या भक्ष्यस्थानी.\nफेब्रुवारी २८ - फ्रांसच्या सैन्याने मादागास्करची राणी रानाव्हलोना तिसरी हिला पदच्युत केले.\nमे १५ - ग्रीस-तुर्कस्तान युद्ध - ग्रीसच्या सैन्याची धूळधाण.\nजून २२ - चार्ल्स रँड याला दामोदर हरी चाफेकर यांनी पुण्यातील जुलमाचा प्रतिशोध म्हणून बंदुकीने गोळ्या घातल्या.\nजुलै १७ - अलास्काच्या क्लॉन्डाइक भागात सोने शोधण्यासाठी गेलेली काही माणसे मुबलक सोन्याची वार्ता घेउन परतली आणि क्लॉन्डाइक गोल्ड रशची सुरुवात झाली.\nजानेवारी १५ - शू चीमो, चिनी भाषेमधील कवी.\nजानेवारी २३ - नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय क्रांतिकारी.\nमार्च ११ - हेन्री डिक्सन कॉवेल, रचनाकार.\nएप्रिल १९ - पीटर दी नरोन्हा, भारतीय उद्योगपती.\nएप्रिल २४ - मनुएल अव्हिला कामाचो, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.\nमे ३ - झाकीर हुसेन, भारतीय राष्ट्रपती.\nमे ६ - पाउल आल्वेर्डेस, जर्मन कवी, लेखक.\nमे १० - आयनार गेर्हार्डसन, नॉर्वेचा पंतप्रधान.\nमे १८ - फ्रँक काप्रा, अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व लेखक.\nजुलै ६ - व्यंकटेश दिगंबर माडगूळकर, श्रेष्ठ मराठी कथाकार आणि कादंबरीकार.\nजुलै २४ - आमेलिया इअरहार्ट, अमेरिकन वैमानिक.\nसप्टेंबर २० - नारायण भिकाजी परुळेकर ऊर्फ नानासाहेब परुळेकर, मराठी पत्रकार.\nसप्टेंबर २६ - पोप पॉल सहावा.\nऑक्टोबर २९ - जोसेफ गोबेल्स, नाझी अधिकारी.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स.च्या १८९० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ ऑक्टोबर २०१४ रोजी २२:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/600870", "date_download": "2018-08-18T10:26:49Z", "digest": "sha1:45MGSXHTWXS3GLBEUZXQWLG5SKARLOUX", "length": 4779, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रायगडमध्ये 2.8 रिश्टर स्केलचा भूंकप - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » रायगडमध्ये 2.8 रिश्टर स्केलचा भूंकप\nरायगडमध्ये 2.8 रिश्टर स्केलचा भूंकप\nऑनलाईन टीम / कल्याण :\nठाणे जिह्यातील कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसराला रात्री साडेनऊच्या सुमारास 2.8 रिश्टर स्केल इतक्मया भूकंपाचे धक्के बसले. कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली, उल्हासनगर, टिटवाळय़ासह कल्याणजवळील ग्रामीण भागात हे हादरे बसल्याची माहिती समोर येत आहे.\nरात्री 9 वाजून 31 मिनिटांच्या सुमारास कल्याण डोंबिवली परिसरात अचानक कंपनं आणि हादरे बसण्यास सुरुवात झाली. साधारणपणे 9 वाजून 33 मिनिटांपर्यंत म्हणजेच सुमारे 2 ते 3 मिनिटं हे हादरे जाणवल्याची माहिती कल्याण डोंबिवलीतील अनेक नागरिकांनी एलएनएनला दिली. अचानक बसलेल्या या हादऱयांनी कल्याणच्या अनेक भागात नागरिक घाबरून घराबाहेर जमा झाले. तर हादऱयांमुळे काही जणांच्या घरातील भांडी पडल्याची माहितीही प्रत्यक्षदर्शीनी दिली.\nकोणताही निर्णय घेण्यास शरद यादव स्वतंत्र\nबालाजीनगरमध्ये अज्ञातांनी फाडल्या दुचाकींच्या सीट्स कव्हर\nअर्थमंत्री अरुण जेटलींना एम्समधून मिळाला डिस्चार्ज\nज्येष्ठ पत्रकार शुजात बुखरी यांची गोळय़ा झाडून हत्या\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/parampara-ani-navata-news/articles-in-marathi-on-creativity-skills-in-human-brain-1612150/", "date_download": "2018-08-18T11:15:54Z", "digest": "sha1:CC3SGIGCR2NNLHJUGN5QQ7L4SSAE4HM2", "length": 23095, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Articles in Marathi on creativity skills in Human Brain | नवे-जुने, अधिक-उणे आणि आपण | Loksatta", "raw_content": "\nबेशिस्त वाहनचालकांना ९१ लाखांचा दंड\nपक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा\nपुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित\nजळगावमध्ये महाजन-खडसे गटबाजीची सर्वत्र बाधा\nएमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल\nपरंपरा आणि नवता »\nनवे-जुने, अधिक-उणे आणि आपण\nनवे-जुने, अधिक-उणे आणि आपण\n‘आपण जिथे आहोत तिथवर कसे आलो’\n‘आपण जिथे आहोत तिथवर कसे आलो’ या विचाराचा धागा ‘आपण जिथे होतो तिथे तरी कसे आलो’ या विचारांशी जोडलेला आहे. मी विशिष्ट कुटुंबात जन्मलो. विशिष्ट संस्कारात वाढलो. पुण्यासारख्या शहरात आलो आणि राहिलो. माझ्यावरील संस्कारांना माझ्या स्वत:च्या अशा गुणदोषांची जोड मिळाली. या सगळ्यातून माझा प्रवास वैचारिक आणि भौतिकदृष्टय़ा एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर होत गेला. हे जसं माझं झालं तसंच इतरांचंही झालेलं आहे. आणि हे होत राहणार आहे. या प्रवासात प्रत्येकाच्या बाबतीत काही सूक्ष्म तर काही ठळक टप्पे असतील. प्रत्येकाची वेगळी कथा असेल. माणसाचा हा जो प्रवास आहे, ‘जनांचा प्रवाह’ जो चालला आहे त्याचं संपूर्ण, सुस्पष्ट आकलन एका व्यक्तीला, एका विचारधारेला होणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे. आपण सगळ्यांनी एकत्रितपणे जो खेळ मांडला आहे तो विस्मयचकित करणारा आहे, त्रस्त करणारा आहे, हताश-दु:खी-अस्वस्थ करणारा आहे व कुतूहलाने उत्साहित करणाराही आहे. माणसाविषयी आस्था असेल, करुणा असेल तर माणसांच्या प्रवासाची गोष्ट समजून घेणं आत्मिक समाधान देणारा अनुभव ठरू शकतो.\nमला नेहमी असं वाटतं की प्रश्न माणसांचा असण्यापेक्षा माणसांच्या संख्येचा असतो. ‘परंपरा’ आणि ‘नवता’ या दोन्हीकडे बघताना हे लक्षात ठेवावं लागतं. मी जेव्हा एखाद्या गोष्टीला ‘परंपरा’ म्हणतो तेव्हा ती गोष्ट काही जणांच्या जीवनशैलीचा भाग असते. कदाचित तेही त्या गोष्टीकडे ‘हे परंपरेने चालत आलेलं आहे’ अशा दृष्टीने, ‘परंपरा’ नामक काहीएक चीज अस्तित्वात आहे हे मान्य करून बघत असतील. पण त्यामुळे त्यांच्या मनात संघर्ष निर्माण होत नाही. माझ्या मनात तो होतो. मला ‘नवता’ आकर्षित करते. पण मी इथे स्वत:ला एक प्रश्न विचारला पाहिजे. तो असा की परंपरेचं काटेकोर पालन करणारा एखादा मनुष्य कधीच काही ‘नवीन’ करत नाही का परंपरा आणि नवता या संज्ञा बहुतेकदा धर्म, श्रद्धा, नैतिकता या संदर्भात आणि सामाजिक व्यवस्थेच्या मूल्यांसंदर्भात वापरल्या जात असल्याने जगण्याची इतर अंगे – ज्यात व्यावसायिक, आर्थिक अंग प्रमुख आहे – दुर्लक्षित राहतात. एखादा धार्मिक, सश्रद्ध माणूस आहे. तो त्याबाबतीत परंपराप्रिय आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण तोच माणूस एखाद्या कंपनीत ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ विभागात महत्त्वाचं काम करतो आहे, त्याच्यात संशोधनाबद्दल आस्था आहे. म्हणजे धार्मिकदृष्टय़ा तो परंपरेचा पाईक असला तरी त्याच्या कार्यक्षेत्रात तो नवतेचा पाईक आहे. वरील प्रश्नाच्या जोडीने येणारा दुसरा स्वाभाविक प्रश्नही मी स्वत:ला विचारला पाहिजे – नवतेकडे आकृष्ट होणारा कधीच परंपरेचा आधार घेत नाही का परंपरा आणि नवता या संज्ञा बहुतेकदा धर्म, श्रद्धा, नैतिकता या संदर्भात आणि सामाजिक व्यवस्थेच्या मूल्यांसंदर्भात वापरल्या जात असल्याने जगण्याची इतर अंगे – ज्यात व्यावसायिक, आर्थिक अंग प्रमुख आहे – दुर्लक्षित राहतात. एखादा धार्मिक, सश्रद्ध माणूस आहे. तो त्याबाबतीत परंपराप्रिय आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण तोच माणूस एखाद्या कंपनीत ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ विभागात महत्त्वाचं काम करतो आहे, त्याच्यात संशोधनाबद्दल आस्था आहे. म्हणजे धार्मिकदृष्टय़ा तो परंपरेचा पाईक असला तरी त्याच्या कार्यक्षेत्रात तो नवतेचा पाईक आहे. वरील प्रश्नाच्या जोडीने येणारा दुसरा स्वाभाविक प्रश्नही मी स्वत:ला विचारला पाहिजे – नवतेकडे आकृष्ट होणारा कधीच परंपरेचा आधार घेत नाही का हे प्रश्न आणि त्यांची वास्तव उत्तरे आपल्याला सांगतात की माणूस एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून आणि एक ‘सामाजिक घटित’ म्हणून एकाच वेळी जगत असतो. आपण दुभंग व्यक्तिमत्त्वाविषयी ऐकतो. मला तर वाटतं की माणूस दुभंग तर असतोच, पण तो शतभंगही असू शकतो. त्याच्या जगण्याचे अनेक धागे असतात. तो कधी एखादा धागा सोडून देतो, कधी तोच धागा धरून ठेवतो.\nमाणसाच्या या ‘धरसोडी’चा सूक्ष्म विचार केला तर असं लक्षात येईल की त्यामागे ‘स्वार्थ’ ही प्रमुख अंत:प्रेरणा कार्यरत असते. एक उदाहरण घेऊ. एखादा मनुष्य कौटुंबिक दबावामुळे परंपरेचं पालन करत असेल तर सकृतदर्शनी ‘तो स्वार्थी आहे’ असं आपण म्हणणार नाही. परंतु आपण थोडं अधिक खोलात जाऊ. कौटुंबिक दबावाला झुगारण्याची दुसरा पर्याय निर्माण करण्याची ताकद माझ्यात नाही, त्यामुळे सध्या या चौकटीत राहणंच श्रेयस्कर आहे अशा विचाराने जेव्हा बंधनं स्वीकारली जातात तेव्हा तो ‘स्वार्थी’ विचार असतो हे स्पष्टीकरण आपल्याला मान्य होईल. यासाठी ‘स्वार्थ’ या एकाच संकल्पनेची विविध रूपे लक्षात घ्यायला हवीत. स्वार्थ ही स्व-केंद्री संकल्पना आहे हे बरोबरच आहे. पण त्यातही ‘स्व-विलासी’ आणि ‘स्व-विरोधी’ असा फरक करता येईल. पहिल्यात ‘स्व’चे थेट सुख, तशा सुखाची आकांक्षा आहे. दुसऱ्यात ‘स्व’च्या इच्छेला मुरड घालून, तडजोड करून ‘स्व’रक्षणार्थ मिळवलेलं ‘मानीव’ सुख आहे. मनुष्याकडे ‘स्वार्थी माणूस’ म्हणून पाहिलं तरी त्या स्वार्थाची उकल करता आली तर मनुष्याच्या वागण्यातल्या ‘विसंगतीची संगती’ लावायला मदत होईल.\nतत्त्वज्ञानात द्वंद्ववाद (dualism) ही एक संकल्पना आहे. ही संकल्पना दोन विरुद्ध तत्त्वांचा संघर्ष मांडते. माणसाच्या मनाबाबत मला असं जाणवतं की संस्कृतीजन्य ‘विवेक’ आणि उत्क्रान्तीजन्य ‘विद्रोह’ हा मनाचा एक मुख्य संघर्ष आहे. मन हे कायम या द्विस्थितीमध्ये (dual mode) असतं. इतकंच नाही तर कुठल्याही गोष्टीला ‘एकच बाजू’ नसते, दोन बाजू असतात असं जे आपण म्हणतो त्याअर्थीही मला द्वंद्ववाद महत्त्वाचा वाटतो. ‘एक’ असं काही नसतं, ‘दोन’ असतं, ‘एका’वरच सगळा भार नाही, जे आहे ते ‘दोघां’चं आहे हे समजणं माझ्यासाठी वेळोवेळी महत्त्वाचं ठरलं आहे. याच तर्काने परंपरेचा, नवतेचा किंवा अन्य कुठल्याही संकल्पनेचा ‘एक आणि एकच’ खुलासा करता येत नाही. संकल्पना, विचार विविध पदर घेऊन येतात. त्या सगळ्या बाजूंचं आपलं आकलन जसजसं वाढत जातं तसतशी आपली वाढ होत जाते. हा विचार केंद्रस्थानी ठेवून आपण या सदराची वाट चालणार आहोत.\n‘परंपरा आणि नवता’ हे विंदा करंदीकर यांच्या एका समीक्षात्मक पुस्तकाचे शीर्षक आहे. या सदराविषयी संपादकांशी चर्चा करताना हे नाव सदराच्या विषयवस्तूसाठी मला अगदी समर्पक वाटलं. सार्वजनिक चर्चाविश्वातील अनेक चर्चा या विषयाच्या कक्षेत येतात. साहित्य, कला, सामाजिक प्रबोधन इथपासून राजकीय विचार, विज्ञान-तंत्रज्ञान, आर्थिक-व्यावसायिक क्षेत्र, शेती इथपर्यंत अनेक घटकांना हा विषय स्पर्श करतो. या विषयाचा विचार करताना आपण एक लक्षात ठेवू की ‘परंपरा आणि नवता’ हा एक मोठा ‘स्पेक्ट्रम’ आहे. यात व्यक्तिजीवनातील आणि समाजजीवनातील अनेक अंगे सामावली जाऊ शकतात. त्या सर्वच अंगांविषयी काही मांडणी करण्याची माझी पात्रता नाही. परंतु माझे जे आस्थाविषय आहेत त्याबाबत बोलायला, खरं म्हणजे संवाद साधायला आवडेल. मात्र आपण या संवादात एक काळजी घेऊ. परंपरा म्हणजे ‘क्ष’ नावाची एक गोष्ट आहे आणि ‘नवता’ म्हणजे ‘य’ नावाची एक गोष्ट आहे अशा साचेबद्ध पद्धतीने आपण या संकल्पनांकडे बघायला नको. वैचारिक खुलेपणाने परंपरा आणि नवता या दोन्ही संकल्पनांकडे पाहूया.\n‘जे आहे ते’ आणि ‘जे वाटतंय ते’ या द्वंद्वात माणूस अडकलेला असतो. या द्वंद्वाची धार कमी-जास्त होत असते, पण द्वंद्व संपत नाही. माणसाचं हे एक प्रमुख वैशिष्टय़ आहे आणि ते सर्जनशीलतेचं उगमस्थानही आहे. या द्वंद्वाचा शोध घ्यावा आणि काही धागे आपल्याला सोडवता येतात का ते पाहावं हा या सदरामागचा माझा उद्देश आहे. तो सफल होतो की नाही हे आता वाचकांच्या प्रतिसादावरूनच ठरेल\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nइम्रान खानच्या शपथविधीला सिद्धूंना मानाचे स्थान, घेतली लष्करप्रमुखांची गळाभेट\nEngland vs India 3rd Test - Live : भारताची संयमी सुरूवात, धवन-राहुल जोडीची अर्धशतकी भागीदारी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nIt's Official: नात्यावर शिक्कामोर्तब करत अखेर निक-प्रियांका म्हणाले....\nसहजीवनाचा पहिला टप्पा सर, थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा\nइम्रान खानच्या शपथविधीला सिद्धूंना मानाचे स्थान, घेतली लष्करप्रमुखांची गळाभेट\nमिनी एसयुव्हीसारखं डिझाईन असलेली नवीन रेनाँ क्विड वसूल करते तुमचा पै न पै\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nअंतर्गत वाहतुकीसाठी ट्रामचा पर्याय\nवाहनांना एक टोल माफ\nरेल्वेचे संगणकीय आरक्षण केंद्र पावणेतीन तास बंद राहणार\nस्वानंद देणारे शिक्षण निवडा\nवामनदादा कर्डकांना शाहिरीतून अभिवादन\nभूगावमधील हॉटेलमध्ये कोंबडय़ांच्या झुंजीवर जुगार\nपाणी पुरेना आणि म्हणे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/600872", "date_download": "2018-08-18T10:26:50Z", "digest": "sha1:GD262UCNMW5KOA5I27TJMDE6DXLTL2HD", "length": 5204, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Trucaller वर कॉल रेकॉर्डचे नवीन फिचर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » Trucaller वर कॉल रेकॉर्डचे नवीन फिचर\nTrucaller वर कॉल रेकॉर्डचे नवीन फिचर\nऑनलाईन टीम / पुणे :\nस्मार्ट फोन युजरसाठी एक चांगली बातमी आहे. ‘ट्रु कॉलर’ त्यांच्या युजर्ससाठी कॉल रेकॉर्डची नवी सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे तुम्ही आता कोणताही कॉल रेकॉर्ड करू शकता. याआगोदर कोणी फोन केला याची माहिती ‘ट्रू कॉलर’च्या माध्यमातून मिळत होती. आता त्यापुढे जाईन हे नवीन फीचर्स आणले आहे.\n‘ट्रू कॉलर’च्या मदतीने युजर्स कोणताही कॉल रेकॉर्ड करू शकणार आहे. कंपनीने त्यांच्या संकेतस्थळावर या नवीन फीचरची माहिती दिलेय. ट्रू कॉलरच्या नव्या फिचरमुळे रेकॉर्ड केलेले कॉल डिव्हाइसमध्ये सेव्ह होणार आहेत. तर पहिल्या 14 दिवसांसाठी ग्राहकांना हे फीचर्स मोफत वापरता येईल. त्यानंतर मात्र या फीचर्ससाठी पैसे द्यावे लागणार आहेत. दरम्यान, युजर्सच्या खासगीपणाचा मुद्दा लक्षात घेऊन कंपनीकडून कॉल रीड केला जाणार नाही किंवा कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नाही. युजर्सने रेकॉर्ड केलेले कॉल फक्त युजर्सच ऐकू शकणार आहेत. ट्रू कॉलरचं हे नवीन फिचर फक्त अँड्रॉइड 5.0 आणि त्याच्या पुढील व्हर्जनमध्येच चालणार आहे. दरम्यान, अँड्रॉइड 7.1.1 नुगावर हे फिचर सुरू होणार नाही.\nHonor V9 स्मार्टफोन लवकरच लाँच\nJio 4G VoLTE फिचर फोन लाँच\nLG GPad X2 8.0 Plus टॅबलेट लवकरच लाँच\nजगातील सगळय़ात छोटा फोन भारतात लाँच\nPosted in: माहिती / तंत्रज्ञान\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2011/06/03/%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-18T10:51:45Z", "digest": "sha1:NNY7BMKIWD62QRFPVV7GK3KAM5WQEB5A", "length": 54925, "nlines": 521, "source_domain": "kayvatelte.com", "title": "शुभेच्छा | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← जिभ कापा, नोकरी मिळवा..\nएक तरी कविता अनुभवावी .. →\nपरवाचीच गोष्ट आहे. निरजाच्या स्टेटस वर वाचलं की तिचा लग्नाचा वाढदिवस आहे. अर्थात तिने सरळ तसं लिहिलं नव्हतं, पण जे काही लिहिलं होतं, त्यावरून मी हा अर्थ काढला , आणि तिला सेल फोन वरूनच काँग्रॅच्युलेट करणारा मेसेज टाकला. थोड्याच वेळात तिचं उत्तर आलं- कॉग्रॅच्युलेशन्स कशाबद्दल बरं ही कॉमेंट वाचूनही माझ्या डोक्यात तसा काही प्रकाश पडला नाहीच. म्हंटलं, तुझा आज लग्नाचा वाढदिवस आहे ना, म्हणून मी अभिनंदन या शब्दाचं इंग्रजीत कॉंग्रॅच्युलेशन्स लिहीलं. सेल फोन वर मराठी टाइप करता येत नाही म्हणून इंग्रजी मधे.\nत्या नंतर एक-दोन दिवसानंतर तिचा एक मेसेज आला, त्यात लिहिलं होतं “शुभेच्छा” आणि माझी एकदम ट्युब पेटली- अरेच्या.. तिचा लग्नाचा वाढदिवस, आणि मी वेड्यासारखं अभिनंदन काय करतोय\nशुभेच्छा देतांना पण आपण इतक्या मेकॅनिकल पद्धतीने देतो की आपण कुठला शब्द वापरतोय, आणि त्याचा काय अर्थ निघेल या कडे आपले लक्षच नसते. बरेचसे शब्द असेच नकळत वापरले जातात- नको त्या ठिकाणी. आपण अजिबात विचार न करता त्या क्षणी आठवेल तो शब्द लिहत असतो. म्हणजे याचा अर्थ आपण मनापासून शुभेच्छा देत नाही असा होतो का नाही तसे नाही वाटत मला.\nही अशी चूक बरेचदा केल्या गेलेली दिसते. आता हेच पहा नुकतीच एक बातमी वाचली, ” जगदीश खेबुडकर यांचे दुःखद निधन” – आता हे सांगा, की निधन हे कोणाचेही असो, नेहेमीच दुःखदच असते, तेंव्हा ’दुःखद’ निधन हा शब्द वापरायची गरज खरंच आहे का आणि नंतर पुढे दळण दळल्या सारख्या “मृतात्म्यास शांती देवो , त्यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली, एक सुन आणि बारा नातवंडं असा परिवार आहे”अशाही ओळी लिहिलेल्या असतात. कोणी मृत्यु झाला की , कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण होते ( कुठे आणि नंतर पुढे दळण दळल्या सारख्या “मृतात्म्यास शांती देवो , त्यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली, एक सुन आणि बारा नातवंडं असा परिवार आहे”अशाही ओळी लिहिलेल्या असतात. कोणी मृत्यु झाला की , कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण होते ( कुठे ) मला वाटतं की पेपरवाल्यांचा बातमीचा फॉर्मॅट पक्का असतो, फक्त मधली नावं बदलली की झालं ) मला वाटतं की पेपरवाल्यांचा बातमीचा फॉर्मॅट पक्का असतो, फक्त मधली नावं बदलली की झालं \nकोणीतरी एक जण बझ किंवा फेसबुक वर एक पोस्ट टाकतो, आणि इतर सगळॆ जण मृतात्म्यास शांती मिळो म्हणून खाली कॉमेंट टाकतात . ब्लॉग वर पण असंच काहीतरी पोस्ट लिहीण्याची टूम निघाली आहे. ( मी पण असे एक दोन पोस्ट्स टाकले आहेत पूर्वी) 🙂\n” मृतात्म्याला शांती देवो” वाचलं, की मला एक प्रश्न नेहेमी पडतो- ’आत्मा ’हा ’मृत’ कसा काय होईल बरं मृत शरीर असतं आत्मा नाही. आणि जरी समजा मान्य केलं , की आत्मा मृत झाला, तर मग त्याला शांती कशाला हवी मृत शरीर असतं आत्मा नाही. आणि जरी समजा मान्य केलं , की आत्मा मृत झाला, तर मग त्याला शांती कशाला हवी कोणाचा मृत्यु झाला की अशी ठरावीक वाक्य बोलायची पद्धत आहे. काही शब्द उगाच आहेत म्हणून वापरायचे असा प्रघात पडलेला आहे.\nमौंजी मधे तर बटूला शुभाशीर्वाद देण्याची पद्धत आहे. आता आशीर्वाद हा ’शुभच’ असतो नां मी आजपर्यंत कोणी कोणाला ’वाईट’ आशीर्वाद दिलेला ऐकला नाही, मग ’शुभाशीर्वाद’ लिहीण्याची खरंच काही गरज आहे का मी आजपर्यंत कोणी कोणाला ’वाईट’ आशीर्वाद दिलेला ऐकला नाही, मग ’शुभाशीर्वाद’ लिहीण्याची खरंच काही गरज आहे का नुसता आशीर्वाद लिहीला तरी पुरेसा आहे.\nलग्नाच्या शुभेच्छा देणाऱ्यांचे दोन गट असतात- एक म्हणजे लग्न झालेले, जे म्हणत असतात की चला बरं झालं, सारखा ट्रेकिंग काय, भटकणं काय … सुरु असायचं आता, आता लग्न झालं की हा पण आपल्यासारखाच होणार म्हणून आनंदी होणारे, आणि दूसरे म्हणजे लग्न न झालेले ” च्यायला, साली मजा आहे याची आता,मस्त, बायको येईल , छान छान पदार्थ करून खाऊ घालेल आणि इतर मजा तर आहेच” असं म्हणणारे ( घी देखा लेकीन बडगा नहीं देखा या प्रकारातले )लोकं. लग्नात विश यु हॅप्पी मॅरीड लाईफ म्हणून शुभेच्छा देण्ण्याचा प्रघात आहे. आता लग्न केलं ते काय दुःखी व्हायला का सुखी रहायलाच लग्न केलंय की राव, मग ह्या कसल्या शुभेच्छा\nएखादी आजी ’नांदा सौख्य भरे” म्हणून तोंड भरून आशीर्वाद देतात तेंव्हा त्यांच्या वैवाहिक आयुष्यातल्या सगळ्या कडू गोड घटनांचा पाढा त्यांच्या नजरेसमोरून जात असेल , आणि आपण स्वतः किती आनंदाने , सौख्यभरे नांदु शकलो ते आठवत हळूच पदराने डोळे टिपते, यावर माझ्या बायकोच्या कवितेच्या दोन ओळी लिहीतो..\n“मग हळूच उघडला तिच्या ह्र्दयातला चोर कप्पा…..\nबिलोरी वर्खाच्या त्या कप्प्यात….\nआठवली तिला गमतिची स्वतःची लग्नानंतरची पाठवणी\nआयुष्यातल्या बेरजेचा न चुकता हिशेब सांगत होती….\nजिवनाची वजाबाकी मात्र डोळ्यांच्या कडातुन सांडत होती”\n३१ डिसेंबर पासूनच शुभेच्छा देणारे एसएमएस सुरु होतात. दुपारी तीन वाजता एसएमएस येतो, की अजून ९ तासांनी नवीन वर्ष सुरु होणार आहे, आणि मी तुला पहिला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ( हार्दिक म्हणजे काय विचारू नका राव) देणारा पहिला असावा, म्हणून तुला हा मेसेज पाठवलाय. वाह, क्या बात है, असा मेसेज पाहिला की मला तर एकदम भरून येतं- 🙂 बरं ह्या व्यतिरिक्त कमीत कमी २००-२५० लोकं तरी शुभेच्छांचे एसएमएस पाठवतात. इतके मेसेजेस आल्यावर सगळ्यांना आपल्याला पटत असो किंवा नसो, सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्युत्तर पाठवावेच लागते . मग एकाची टॊपी दुसऱ्याला या उक्ती प्रमाणे एकाचा मेसेज दुसऱयाला, दुसऱ्याचा तिसऱयाला अशा प्रकारे आपणही या मेसेजेसच्या खेळीमधे अडकले जातो- शेवटी फायदा होतो तो सेलफोन कंपन्यांचा.\nतरूणांमधे अजूनही कार्ड देण्याची क्रेझ आहेच. आर्चीस चे कार्ड्स तर लग्न होण्यापूर्वी बरीच वर्ष आणि झाल्यावर पहिल्या वर्षी तरी नक्कीच वापरले जातात. 😉 नंतर मग ’जाने कहां गये वो दिन… ’ असं होतं- किंवा जर कौतुकाने बायको साठी कार्ड आणलं, तर आधी उलटं करून आर्चीस चं आहे का ते पहाणार, आणि मग आतला मजकूर वाचणार, आणि मग जर समजा, ’आर्चीसचं’ असेल तर कशाला तू उगाच शंभर रुपये खर्च केलेस त्या पेक्षा आईस्क्रिम आणलं असतं तर……. असं म्हणणार…………. त्या पेक्षा आईस्क्रिम आणलं असतं तर……. असं म्हणणार………….\nकाही लोकं आवर्जून हा मेसेज पाठवतात, की आम्ही हिंदू आहोत, आणि आमचे नववर्ष गुढीपाडव्याला सुरु होते,आणि म्हणून आम्ही शुभेच्छांची देवाण घेवाण करत नाही. असा मेसेज पण बऱ्याच लोकांच्या फेसबुक स्टेटस वर दिसतो. हे असं लिहील्याने काय साध्य होते तेच मला समजत नाही. जर तुम्हाला लोकांनी”नववर्ष सुखाचे जावो” म्हणून शुभेच्छा दिल्याच, तर अंगाला काय भोकं पडणार आहेत का नाही ना मग त्या शुभेच्छा सेव्ह करून ठेवा आणि मग गुडीपाडव्याला पुन्हा एकदा वाचा नां… किंवा फारच झालं, तर आलेल्या शुभेच्छा, तर डीलीट करून टाका. हे असे संदेश स्टेटस वर टाकून खरंच काय मिळवलं जातं जग जर मानत असेल तर ठीक आहे… मानू द्या नां जग जर मानत असेल तर ठीक आहे… मानू द्या नांमी स्वतः आर एस एस चा आहे, तरी पण हे इथे लिहतोय मी स्वतः आर एस एस चा आहे, तरी पण हे इथे लिहतोय मुळातच आपण उत्सवप्रिय आहोत. कुठलाही प्रसंग आपल्याला सिलेब्रेशन साठी चालतो.\nबरं एक जानेवारीला नववर्ष झालं, की पुन्हा मग गुढीपाडव्याला पुन्हा शुभेच्छांची देवाण घेवाण होतेच, नंतर बलीप्रतीपदेला पुन्हा एकदा, व्यापाऱ्यांचे नवीन वर्ष म्हणून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातातच . अरे किती वेळा नववर्ष साजरे करायचे काही लिमीट आहे की नाही काही लिमीट आहे की नाही जर तुमचे कोणी इतर मित्र मैत्रीण असतील,तर पटेटी -पार्सी नव वर्ष, वगैरे आहेतच. ३१ मार्च नंतर एप्रील मधे पुन्हा नवीन फायनान्शिअल इयर सुरु झालं म्हणून शुभेच्छा देणारे इ मेल्स येतात. अरे किती वेळेस नववर्ष साजरं करायचं हेच मला समजत नाही.\nजयंती आणि पुण्यतिथीबाबतही शुभेच्छा देण्याची पण पध्दत निघाली आहे. जो माणूस जायचा तो गेला. खूप मोठा माणूस होता, त्याने सामाजिक कार्य पण केले, जिवंत असतांना त्याचा खूप लौकिक होता , पण अजूनही जयंतीच्या शुभेच्छा कशाला एखाद्याला सहज विचारून पहा जयंती म्हणजे काय ते एखाद्याला सहज विचारून पहा जयंती म्हणजे काय ते\nहॅपी बर्थ डे, किंवा मेनी मेनी हॅपी रीटर्न्स ऑफ द डे या घासून घासून गुळगुळीत झालेल्या शुभेच्छांच्या ओळी खरंच जर मनापासून दिल्या ना, तर सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. माझ्या मते वाढदिवस म्हणजे आयुष्यातले एक वर्ष संपले, कमी झाले, याची आठवण करून देणारा दिवस , किंवा आज डायटींग विसर आणि भरपूर केक खा म्हणून सांगायचा दिवस- आणि त्याच बरोबर आता तू मोठा झालास, सुज्ञ झालास, थोडं वैचारिक उत्थापन ( शब्द बरोबर असावा) होऊ दे तुझं. जरा बाष्कळ विनोद करणं बंद कर, वयाप्रमाणे वागत जा.. हे सगळं सांगणारा दिवस या दिवशी मात्र आपल्या संपर्कात असलेल्या प्रत्येकाला आपण शुभेच्छा या द्यायलाच हव्या असे माझे प्रामाणिक मत आहे. पण नेमकं इथे पण लोकं शुभेच्छा देण्याचा कद्रुपणा करतांना दिसतात.\nकाही लोकांना कुणाचा हात किंवा पाय फ्रॅक्चर झाला की खूप मजा वाटते. मग त्याला भेटायला गेल्यावर त्याच्या प्लास्टर वर गेट वेल सुन, एक स्मायली, वगैरे काढतात. इतपत शुभेच्छा देणे असेल तर ठीक आहे, पण जेंव्हा कोणी आजारी पडतो , आणि त्याला दवाखान्यात ऍडमीट केल्यावर भेटायला गेले, की त्यांच्या कोणातरी जवळच्या नातेवाईकाला किंवा मित्राला तरी हाच रोग झालेला असतो आणि तो जेंव्हा सांगतो की ” आमच्या काकांचं पण असंच झालं होतं” आणि ते आठच दिवसात गेले बरं का” तेंव्हा हा माणूस शुभेच्छा द्यायला आला, की मानसिक त्रास द्यायला असा संशय येतो..\nहे सगळं वाचल्यावर आता खरंच ह्या शुभेच्छांना आवरा म्हणायची वेळ आलेली आहे असे वाटते की नाही जर द्यायच्या असतील तर खरंच फोन करा, मनापासून शुभेच्छा द्या.. अशा वर वरच्या नकोत..\n(संदर्भ :- मित्राशी मारलेल्या गप्पा )\n← जिभ कापा, नोकरी मिळवा..\nएक तरी कविता अनुभवावी .. →\nहाहाहा.. मस्तच.. शुभाशिर्वाद वरून ‘पाठीमागची बॅकग्राउंड’, ‘Reply back’ वगैरे आठवलं :))\nअसे खूप शब्द आहेत. बोलतांना जास्त विचार न करता बोलल्या जाणारे.\n……” मृतात्म्याला शांती देवो” वाचलं, की मला एक प्रश्न नेहेमी ….\nमी कुठल्याश्या चित्रपटात ऐकलं होतं – एक साधू कोणाच्यातरी मृत्यूची बातमी ऐकून – “स्वर्गं गच्छती पुण्यात्मा” – अशी प्रतिक्रिया देतो.\nआत्म्याला सदगती लाभो हे पण म्हणताना ऐकलं आहे.\n’शांती लाभो’ हे ख्रिश्चन कन्सेप्ट वर आधारीत आहे हे लक्षात आलं नव्हतं\nमस्त झाला य लेख. बर्‍याच गोष्टींचा लॉजिकली विचार होतच नाही. एसएमएस सेवेमुळे रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या देखील शुभेच्छा येतात. आत्ता हळूहळू बैलपोळा, नागपंचमी आणि वटपोर्णिमेच्या शुभेच्छापण येतील.\nबैलपोळा – हे हे हे सर्व गाई बैलांस बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा\nबैल पोळ्याच्या शुभेच्छा वाचल्या होत्या कुठल्यातरी ब्लॉग वर . आता ब्लॉग पर्यंत तर पोहोचल्या आहेतच या बैलपोळ्याच्या शुभेच्छा, लवकरच सेल फोन वर पण पोहोचतील, आणि एकदा सुरु झालं, की साथीच्या रोगाप्रमाणे पसरत जाईल.\nअंधश्रद्धा निर्मुलन समितीत असताना ’शुभ” शब्दाच एवढ वावडं कि वार्तापत्राच्या जाहिरातीत देखील शुभेच्छा शब्दा ऐवजी सदिच्छा शब्द जाणीवपुर्वक वापरला जातो. शुभेच्छा शब्द वापरणारा अंधश्रद्धाळु.\n“आधी उलटं करून आर्चीस चं आहे का ते पहाणार, आणि मग आतला मजकूर वाचणार, आणि मग जर समजा, ’आर्चीसचं’ असेल तर कशाला तू उगाच शंभर रुपये खर्च केलेस त्या पेक्षा आईस्क्रिम आणलं असतं तर……. असं म्हणणार………”\nलॉल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्झ……. दादा खरेच ह्या पोरी अश्याच असतात राव, लग्न झाले नाही की “सेव्हिंग” “पुढचे बघा” “नीट वागा” वगैरे सुरु होतेच, लग्न झाले नाही की “सेव्हिंग” “पुढचे बघा” “नीट वागा” वगैरे सुरु होतेच नसता पोक्तपणा आणल्यागत, आपण बापेलोक तर लग्न झाल्यावरही बहुदा १-२ वर्षे “खुले सांड” फ़ेझ मधे असतो बहुदा….. नसता पोक्तपणा आणल्यागत, आपण बापेलोक तर लग्न झाल्यावरही बहुदा १-२ वर्षे “खुले सांड” फ़ेझ मधे असतो बहुदा….., नेहमीप्रमाणे लेख काय वाटेल ते आहे पण जबराट आहे\nबघ, तुला पण अनुभव येईलच.. 😀\nअसे विनाकारण खर्च अजिबात आवडत नाही केलेले. 🙂\nमृतात्मा शब्दाबद्दल मी देखिल आधी हेच म्हणत असे…आत्मा मृत कसा\nपण नंतर लक्षात आलं की मृतात्मा ह्या शब्दाचा संधि हा मृत आत्मा असा नसून मृत व्यक्तीचा आत्मा..जो शरीर सोडून गेलाय…तो इथे तिथे भरकटत राहू नये(हे सगळं मानण्यावर आहे बरं का) म्हणून त्या सदिच्छा…मृतात्म्यास शांति लाभो,सद्गती लाभो इत्यादि.\nलग्न झालेल्या वधुवरांना आशीर्वाद द्यायचाच झाला तर तो….\nनांदा सौख्यभरेच्या चालीवर..भांडा सौख्यभरे असा द्यावा. 😉\nकारण ज्यांचे आपापसात कधीच भांडण होत नाही असे एकही जोडपे ह्या पृथ्वीतलावर नसेल.\nहे भांडा सौख्यभरे मस्तच आहे. भांडल्या शिवाय काही मजा पण नाही आयुष्यात. दररोज इतकी वर्ष एकत्र रहायचं, मग बहूतेक सगळे विषय चर्चेला घेऊन संपलेले असतात. कुठले विषय टाळायचे, कुठल्या विषयावर बोलायचे, सगळे काही समजलेले असते. मग अशा वेळी हे भांडण म्हणजे पण एक विरंगुळा असतो असे मला वाटते.\nम्हणूनच काही कारण नसतांना पण भांडणं होतातच नां..\nहा हा हा.. वाढदिवसाला श्रद्धांजली.. प्रचंड आवरा आहे.\nकाही गोष्टींचा आता अतिरेक झाल्याने नकोसं वाटतं. एसएमएस मधे माझ्या मुली तिस रुपयांचे कार्ड घालतात, त्या मधे १००० मेसेजेस फ्री असा काहीसा प्लान आहे. सारखे मित्रमैत्रीणींना मेसेजेस सुरु असतात. म्हणते की बोलण्यापेक्षा स्वस्त पडतं..\nसामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्युत्तर पाठवावेच लागते . I totally agree with this kaka.. well said…\nमग एकाची टॊपी दुसऱ्याला या उक्ती प्रमाणे एकाचा मेसेज दुसऱयाला, दुसऱ्याचा तिसऱयाला अशा प्रकारे आपणही या मेसेजेसच्या खेळीमधे अडकले जातो- शेवटी फायदा होतो तो सेलफोन कंपन्यांचा. +1\nहे मेसेज मेसेज खेळायचा जाम कंटाळा आहे मला. पण जर उत्तर पाठवलं नाही, तर अरे एक रुपया पण खर्च करू शकत नाहीस तू असे म्हणून ठणकावणारे मित्र पण आहेत. एकदा एका मित्राने असाच फोन केला, आणि माझ्या लक्षत आलं की त्याला वाईट वाटलंय म्हणून हल्ली सगळ्यांना उत्तर देतो.. काय करणार असे म्हणून ठणकावणारे मित्र पण आहेत. एकदा एका मित्राने असाच फोन केला, आणि माझ्या लक्षत आलं की त्याला वाईट वाटलंय म्हणून हल्ली सगळ्यांना उत्तर देतो.. काय करणार समाजात रहायचंय नां.. सामाजिक बांधिलकी हा शब्द म्हणूनच वापरलाय.\nआभार.. पण त्या प्रमाणे वागता येत नाही हे मात्र नक्की खरं. सामाजिक बांधिलकी म्हंटलंय ना वर.. म्हणून१\nकाका मला कालच्या मान्सून शुभेच्या आठवल्या, हा हा हा हा\nछान आहे लेख, पण खरच सांगू तुमच्या लेखातून जे वाचते त्याचे मी रिअल लाइफ मध्ये अनन्याच प्रयत्न करते जेवढा जमेल तेवढा, २० % – ४०% ( बाकी आदत से मजबूर) वगैरे कारण मला त्या खरच पटतात\nबरेचदा मेसेज पाठवणाऱ्यांच्या भावना पण असतात त्या मागे. आपल्या आनंदात कोणाला तरी सहभागी करून घ्यावं ही भावना असते. मेसेज किंवा एसएमएस कडे एकदम दुर्लक्षुन किंवा त्याला अगदी खालच्या दर्जाचे म्हणून ट्रीट करूनही चालणार नाही हे पण लक्षात घे. तू मला एसएमएस पाठवला, त्यामागची भावना पण होती ना< की आपल्या आनंदात सहभागी करून घ्यायची\nशुभेच्छा.. लेख छान झालाय 😉\nशुभेच्छा देण्याचा प्रघातचं आहे हल्ली, हैप्पी शिवरात्री, हैप्पी बड्डे हनुमानजी असे एसएमएस आले की हसावं की रडावे हेच कळत नाही. बाकी आत्म्याबद्दल लाख बोललात…\nहो दादा अगदी खरे हे तर मी विसरलेच, हैप्पी शिवरात्री, हैप्पी बड्डे हनुमानजी\nहा हा हा हाहा हा हा हाहा हा हा हाहा हा हा हाहा हा हा हाहा हा हा हा\nदेव पण पळणार आहे\nअरे हा ह्यावरून अजून एक आठवले काकांची मागची पोस्ट, ती असेच रिप्लाय करणार्यांसाठी होती , सॉरी काका\nदोघांचेही आभार. इद उप फितरत किंवा साईबाबाचा मेसेज पन्नास लोकांना एसएमएस ने पाठवा.. वगैरे पण प्रकार आहेतच..\nहे अमेरिकन्स ग्लोबलायझेशन म्हणुन काय करतील नेम नाही हो, अर्नास्तो शे गवेरा (क्युबन स्वातंत्र्ययुद्धात लढलेला अर्जेंटाईन क्रांतिकारी) ला मारले ते सी.आय.ए ने, अर्नास्तो शे गवेरा (क्युबन स्वातंत्र्ययुद्धात लढलेला अर्जेंटाईन क्रांतिकारी) ला मारले ते सी.आय.ए ने ते पण हाल हाल करुन अन आता शे गवेरा टी शर्ट्स, कॉफ़ीमग्स, “रेबेल्स रेबेल” म्हणुन त्याला प्रमोट करुन गंजेड्यांचा देव म्हणुन प्रोजेक्ट करण्याचे प्रताप पण ह्याच अमेरिकन कंपन्या करत आहेत…..\nहे अमेरिकन्स ग्लोबलायझेशन म्हणुन काय करतील नेम नाही हो, अर्नास्तो शे गवेरा (क्युबन स्वातंत्र्ययुद्धात लढलेला अर्जेंटाईन क्रांतिकारी) ला मारले ते सी.आय.ए ने, अर्नास्तो शे गवेरा (क्युबन स्वातंत्र्ययुद्धात लढलेला अर्जेंटाईन क्रांतिकारी) ला मारले ते सी.आय.ए ने ते पण हाल हाल करुन अन आता शे गवेरा टी शर्ट्स, कॉफ़ीमग्स, “रेबेल्स रेबेल” म्हणुन त्याला प्रमोट करुन गंजेड्यांचा देव म्हणुन प्रोजेक्ट करण्याचे प्रताप पण ह्याच अमेरिकन कंपन्या करत आहेत….. उद्या चालुन हनुमान जयंती ची आर्चिस कार्ड्स आली बाजारात तर नवल नको वाटायला\nयेतील.. नक्की येतील. अरे फ्रेंडशीप डे, मदर्स डे, फादर्स डे, असे अनेक डे सिलेब्रेट करण्याची टूम निघाली आहे. लवकरच थॅंक्स गिव्हींग पण सुरु होईल आपल्याकडे..\nहे गवेरा वगैरे प्रकरण मला माहीत नव्हतं.. बरं येणार आहेस ना उद्या मुंबईला\nमी कसला येतोय दादा, मानगुटीवर वेताळ बसला आहे न UPSC चा\nअन आमचा झालाय विक्रम, नेक्स्ट टाईम नक्कीच\nत्याचप्रमाणे, स्वागतम म्हणजेच सु + आगतम. आणि कोणी सुस्वागतम म्हणाले तर त्याचा अर्थ= सु सु + आगतम होतो.\nअरे हो.. हे लक्षातच आलं नव्हतं.. धन्यवाद..\nशुभेच्छा….. आजकाल शुभेच्छा या शुभेच्छा राहिल्या नाहीत, तर तो बाजारीकारणाचा, आपल्या यांत्रिक जीवनाचा एक अविभाज्य घटक झाला आहे. या शुभेच्छा फारश्या भावनाप्रधान मनाने घ्यावयाच्या नसतात.यांत्रिकपणे ओपन करायच्या वाचायच्या आणि निर्जीवपणे डीलीट करायच्या असतात. किंवा उत्सवा प्रसंगी आलेल्या शुभेच्छा तर उघडायची सुद्धा तसदी न घेतलेली बरे.. असे म्हणावे वाटते. शब्द बापुडे केवळ वारा’ अशी या FORWARD MESSAGES ची अवस्था असते.ही मेसेजस निर्लेप भांड्या च्या (NONSTICK) सारखी खोट्या खोट्या मुलामा दिलेल्या आनंदाच्या कल्पनांनी शब्दबद्ध केलेली असतात.\nखरंच फोन करा,….. मनापासून शुभेच्छा द्या……..बिलकुल नको….. कालच इडीयट बोक्स दिवसरात्र बोंबलत होता…… . कोणत्या तरी नवीन संशोधना प्रमाणे मोबाईल वर जास्त बोलण्याने मेंदूचा कर्करोग होतो म्हणुन…. आता कमी बोला…. आणि जास्त मेसेजस करा….. असा सल्ला वैज्ञानिकांनी दिला आहे… … म्हणजे जीवाला जास्त ताप होणार………. . हा ताप न होऊ देण्या करता परत शुभेच्छा देवू का\nमेंदूला कर्क रोग होतो.. खिशात ठेवला तर नपूसकत्व येतं, वगैरे आधी पण ऐकलं आहे. आणि यावर एक पोस्ट पण लिहिलं होतं. कधी ते आठवत नाही. आता हे असं झालंय की माझंच जूनं पोस्ट मला शोधत बसावं लागतं, लवकर सापडत नाही… 😦\nआणि मेसेजेस डिलिट नाही हो करता येत, शेवटी पुन्हा कधी तो माणूस भेटला की काय राव एक रुपया पण खर्च करू शकत नाही का तुम्ही म्हणून सगळ्यांमधे मापं काढतो आपली. त्यापेक्षा एक उत्तर देतो पाठवून मी.किंवा सरळ फोन करतो.\nआता नुकताच फोन बदलल्याने सगळे नंबर्स गेलेले आहेत, त्यामुळे काही मेसेजेस येतात, आणि मग त्यावर नांव नसल्याने समजत पण नाही की कोणाचा मेसेज आहे ते. मी त्याला पण रिप्लाय देऊन मोकळा होतो.. काय करणार\nशुक्र वास रे says:\nआपला “पी.एच्.१” नंबर नक्की काय म्हंजे चुकूनसुद्धा काय द्यायचे नाही ते कळेल…\n पीएच व्हॅल्यु माहीत आहे, हे पीएच१ म्हणजे काय\n” माझ्या बायकोच्या कवितेच्या दोन ओळी लिहीतो..\n“मग हळूच उघडला तिच्या ह्र्दयातला चोर कप्पा…..\nबिलोरी वर्खाच्या त्या कप्प्यात….\nआठवली तिला गमतिची स्वतःची लग्नानंतरची पाठवणी\nआयुष्यातल्या बेरजेचा न चुकता हिशेब सांगत होती….\nजिवनाची वजाबाकी मात्र डोळ्यांच्या कडातुन सांडत होती””\nकाका, काकूंना पण कवितांचा ब्लॉग काढायला सांगा…\nआल्हाद, अरे सुपर्णाताईंचा ब्लॉग काकांनी आधीच सुरु केला आहे.\nती नेट वर नसतेच. टायपींगचा प्रचंड कंटाळा , म्हणून मलाच टाईप करून पोस्ट करावं लागायचं. बरेच लेख आहेत तिचे, पण पाहून पाहून टाईप करण्याचा येतो कंटाळा म्हणून पोस्ट करणे राहून जाते . कॉमेंटला पण प्रत्युत्तर द्यायचा येतो तिला कंटाळा. टायपींग न येण्याचे परीणाम.\nतिच्या कविता म्हणजे पण कधी भांडण झालं, की कर कविता अशा प्रकारात. सध्या पिएचडी मधे बिझी आहे, म्हणून कवीता बंद आहेत, पण काही लेख आहेत लिहीलेले, ( तिन एकशे तरी नक्कीच असतील) करीन पोस्ट..\nआवर्जून प्रतिक्रिया दिल्या बद्दल मनःपूर्वक आभार..\nटॉपिक जे काही मनात येईल ते असतो.. आता पुढचा टॉपीक घेऊन लिहिणं सुरु केलंय. अजूनच वेगळा असेल तो. एकच एक प्रकारचे लिहिले तरी पण वाचायला बोअर होतंच. म्हणून थोडा चेंज हवाच\nखूपच मस्त आहे लेख ……. 🙂\nआपण खूप गोष्टी काहीही कारण नसताना किंवा लोक काय म्हणतील म्हणून करतो\nमनःपूर्वक आभार.. सहज सुचलं म्हणून लिहिलं.. 🙂\nमनःपूर्वक आभार, आणि ब्लॉग वर स्वागत \nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nसिक्रेट मेसेज कसा पाठवायचा\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nashik-news/nashik-msrtc-buses-1565676/", "date_download": "2018-08-18T11:08:14Z", "digest": "sha1:YPOI5THFLEEL64NWCLGNAJUQH4FF76DJ", "length": 17467, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "nashik msrtc buses | बससेवा बंदच्या मार्गावर | Loksatta", "raw_content": "\nबेशिस्त वाहनचालकांना ९१ लाखांचा दंड\nपक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा\nपुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित\nजळगावमध्ये महाजन-खडसे गटबाजीची सर्वत्र बाधा\nएमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल\nप्रवाशांनी भरगच्च भरलेल्या बसेसमध्ये विद्यार्थी दारात लटकलेले दिसतात.\nफेऱ्या रद्द केल्याने प्रवास त्रासाचा; राजकीय पक्षांच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांमध्ये नाराजी\nशहर बस वाहतूक सध्या तोटय़ात आहे. ती एप्रिल- मेपर्यंत पूर्णत: बंद करण्याचा इशारा राज्य परिवहन महामंडळाने दिला असून काही फेऱ्या रद्द करून बंदच्या मार्गावर प्रवास सुरू केला आहे. महामंडळाच्या या पवित्र्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना प्रवास करणे त्रासाचे जात असून या परिस्थितीकडे राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहर बससेवा महापालिकेकडे घेण्यास वा खासगीकरणास संबंधितांचा छुपा पाठिंबा आहे की काय, अशी चर्चा सध्या सुरू आहे.\nएसटी महामंडळाने शहरातील अनेक फेऱ्या बंद करून शहर बससेवा बंद करण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. नियमित बसची संख्या घटल्याने सध्या सर्वच बस थांब्यांवर विद्यार्थी व नागरिकांची एकच झुंबड उडालेली दिसते. बस पकडण्यासाठी शालेय विद्यार्थी जीवघेणी धावपळ करतात. महिला व ज्येष्ठांना तर बसमध्ये चढणे वा जागा मिळणे अवघड झाले आहे.\nप्रवाशांनी भरगच्च भरलेल्या बसेसमध्ये विद्यार्थी दारात लटकलेले दिसतात. त्यातून काही अपघातही घडले आहेत. सीबीएस, सांगली बँक, रविवार कारंजा अशा सर्व भागांत सकाळी व सायंकाळी विद्यार्थ्यांची बस पकडण्यासाठी चढाओढ पाहावयास मिळते. बस फेऱ्या बंद केल्यामुळे ही स्थिती ओढावली असताना केंद्र, राज्य व महापालिकेत सत्तेवर असलेल्या भाजपने शहरवासीयांना वाऱ्यावर सोडून दिल्याची भावना उमटत आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत शहर बस वाहतूक ताब्यात घेण्याचा पालिकेचा मनोदय दिसतो असे सांगितले जात असून त्याची स्पष्टता करणे मात्र टाळले जात आहे. महापालिका आणि एसटी महामंडळाच्या वादात शहरवासीय नाहक भरडले जात आहे.\nयाबाबत लेखी पत्र, स्मरण पत्रे देऊनही महापालिका त्यास प्रतिसाद देत नसल्याने परिवहन महामंडळ सेवा बंद करण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. ही सेवा पूर्ववत राहावी यासाठी महापालिकेने झालेला तोटा भरून द्यावा, तसेच परिवहन मंडळाला करमुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. ‘रोड ट्रान्सपोर्ट कॉपरेरेशन अ‍ॅक्ट १९५०’च्या तरतुदीनुसार राज्यातील रस्ते वाहतूक करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना करण्यात आली. त्यानुसार राज्यात महानगरपालिका हद्द वगळता राज्यात टप्पानिहाय प्रवासी वाहतूक महामंडळ करते.\nमहानगरपालिका, पालिका हद्दीत शहर व ग्रामीण भागात वाहतूक सेवा दिली जाते. वास्तविक वाहतूक सेवा देण्याची जबाबदारी पालिकेची असून राज्यात पुण्यासह अन्य ठिकाणी हा प्रयोग झाला आहे. याबाबत प्रस्ताव देऊनही महापालिका दोन वर्षांहून अधिक काळापासून चालढकल करीत असल्याचा एसटीची तक्रार आहे. फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रचंड गर्दीमुळे शहर बस प्रवास धोकादायक झाला आहे. याबाबत वारंवार ओरड होऊनही सत्ताधारी भाजप, शिवसेना यांच्यासह विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी यावर मूग गिळून बसल्याची प्रवाशांची तक्रार आहे.\nमहापालिका हद्दीत परिवहन महामंडळच्या बसेसने वर्षभरात आपल्या फेऱ्यांमधून ८९१.३२ लाख किलोमीटर इतकेच अंतर कापले. त्यामुळे आतापर्यंत १०८७१.१० (लाख) रुपयांचा तोटा झाला आहे. त्याची भरपाई करावी, अशी एसटी महामंडळाची मागणी आहे. गेल्या पाच पाच वर्षांत १२० कोटी रुपयांहून अधिक तोटा झाल्याचा दाखला महामंडळ देते. त्यात २०१४-१५ मध्ये २८ कोटी ४२ लाख रुपये, २०१५-१६ मध्ये २५ कोटी रुपये आणि चालू वर्षी प्रत्येक महिन्याला सरासरी दोन कोटी रुपये तोटा होत आहे. दरम्यान, हा तोटा कमी करण्यासाठी महामंडळाने शहर बससेवेच्या फेऱ्या टप्प्याटप्प्याने कमी करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत चार हजार ५०० फेऱ्यांमधून दिवसाला ४६ हजार अंतर कापले जात होते. सध्या तीन हजार फेऱ्यांमधून ३० हजार अंतर कापले जात आहे. महापालिकेच्या निर्णयाकडे आता महामंडळाचे लक्ष आहे.\nमहापालिकेने तोटा भरून द्यावा\nएसटी महामंडळास झालेला तोटा महापालिकेने भरून द्यावा, तसेच महामंडळास करमुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत महापालिकेला वेळोवेळी पत्र, स्मरण पत्रे देऊनही त्याबाबत कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.\n– यामिनी जोशी, विभाग नियंत्रक, नाशिक विभाग\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nइम्रान खानच्या शपथविधीला सिद्धूंना मानाचे स्थान, घेतली लष्करप्रमुखांची गळाभेट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसहजीवनाचा पहिला टप्पा सर, थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा\n पिंपरीत पित्याने दोन मुलांची हत्या करुन केली आत्महत्या\nIt's Official: नात्यावर शिक्कामोर्तब करत अखेर निक-प्रियांका म्हणाले....\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nअंतर्गत वाहतुकीसाठी ट्रामचा पर्याय\nवाहनांना एक टोल माफ\nरेल्वेचे संगणकीय आरक्षण केंद्र पावणेतीन तास बंद राहणार\nस्वानंद देणारे शिक्षण निवडा\nवामनदादा कर्डकांना शाहिरीतून अभिवादन\nभूगावमधील हॉटेलमध्ये कोंबडय़ांच्या झुंजीवर जुगार\nपाणी पुरेना आणि म्हणे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-kelghar-ghat-54823", "date_download": "2018-08-18T10:56:12Z", "digest": "sha1:XRWDPRKZTGKONYN74BLTAQLUUJM34L3T", "length": 13510, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news kelghar ghat ‘काळा कडा’ बनलाय मृत्यूचा सापळा | eSakal", "raw_content": "\n‘काळा कडा’ बनलाय मृत्यूचा सापळा\nशनिवार, 24 जून 2017\nमेढा - पश्‍चिम जावळीतील केळघर घाट धोकादायक झाला आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे घाटात कधीही गंभीर परिस्थिती निर्माण होवू शकते. तातडीने ठोस उपाययोजनांची करण्याची आवश्‍यकता आहे.\nमेढा - पश्‍चिम जावळीतील केळघर घाट धोकादायक झाला आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे घाटात कधीही गंभीर परिस्थिती निर्माण होवू शकते. तातडीने ठोस उपाययोजनांची करण्याची आवश्‍यकता आहे.\nमेढामार्गे महाबळेश्वरला जाण्यासाठी नेहमी जाणारे चाकरमानी, कोकणवाशी तसेच कामगार व मोलमजूरी करणारे शेकडो हात याच केळघर घाटाला अधिक पसंती देतात. मात्र, याच केळघर घाटात पावसापूर्वी आज एवढी धोकादायक परिस्थिती झाली आहे की प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाला जीव मुठीत घेवून जात असल्याचा प्रत्यय येईल. नेहमी जा- ये करणारांना धोका कोठे आहे, कोठे थांबू नये, कोठून प्रवास तातडीने करावा, असे बारकावे माहीत असल्याने ते सुसाट निघून जातात. मात्र, पर्यटन आणि मौजमजा करण्यासाठी येणारी मंडळी मात्र घाट रस्त्यात झाडाखाली दरडीलगत गाड्या लावून निसर्गाचा आनंद घेतात.\nमात्र, कधी काय घडेल याचा नेम नाही. तेव्हा या पर्यटकांची काळजी व दक्षता घेणे हे काम कोणाचे याचा नेम नाही. तेव्हा या पर्यटकांची काळजी व दक्षता घेणे हे काम कोणाचे जिथे धोकादायक ठिकाणे आहेत तिथे सूचना फलक कोणी लावायचे जिथे धोकादायक ठिकाणे आहेत तिथे सूचना फलक कोणी लावायचे जे फलक जुने जीर्ण आहेत, ते ठळक करून चालकांचे लक्ष वेधणे गरजेचे आहे.\nतब्बल १८ किलोमीटरच्या घाटात अति तीव्र धोकादायक ठिकाणे १८ पेक्षा अधिक आहेत. रस्ता काही ठिकाणी कडेला खचलेला आहे. अनेक ठिकाणी संरक्षण कठडे अपघातात तुटलेले आहेत. त्यामुळेही अपघाताला निमंत्रण मिळत आहे. रस्ते अरुंद व साइडपट्टी खराब अशी विचित्र अवस्था आहे. त्यामुळे वाहन चालविताना मोठी कसरत होत आहे.\nघाटात काळा कडा या नावाने प्रसिध्द असलेले अपघात ठिकाण आता मृत्यूचा सापळाच झालेले आहे. या ठिकाणी मोठा दगड रस्त्यातच पडलेला आहे. या दगडामुळे या ठिकाणी एकेरी वाहतूक होते. विशेष म्हणजे प्रशासनाला सहा महिने झाले हा दगडच हालविता आला नाही. या परिसरात तर कधी दरडी व दगडे कोसळतील हे सांगणे अशक्‍य आहे. ही काळजी प्रशासनाने या पूर्वीच घेतली पाहिजे होती. मात्र, त्याकडेही अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे. एखादी घटना घडली तर याला जबाबदार कोण, असा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.\nकेळघर घाटातील कामे तातडीने होणे आवश्‍यक आहे. प्रवासी संख्या मोठी आहे. दुर्घटना घडण्यापूर्वीच काळजी घेतली तर सर्वांसाठीच सुरक्षितता ठरेल.\n-संतोष कदम, रा. वरोशी, प्रवासी\nएमआयएम नगरसेवक मतीन यांना अटक\nऔरंगाबाद- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला नकार देणारे औरंगाबादमधील एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना आज अटक करण्यात...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nसंग्रामपूर : वाण धरण ६५ टक्के भरले\nसंग्रामपूर : सातपुडा पर्वतामधील तीन जिल्ह्यांसाठी जलसंजीवनी ठरलेले वाण धरण 65 टक्के भरले आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या ...\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून सहाजण जखमी\nबेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने बंगळूरकडे जाणारी व्हीआरएलची आराम बस उलटून चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय...\nरावेतला स्वतंत्र पोलिस चौकीची मागणी\nवाल्हेकरवाडी - रावेत परिसराचा विकास झपाट्याने वाढत आहे, त्याचप्रमाणे गुन्हेगारीही वाढत आहे. रावेत परिसरात गुन्हा घडला अथवा काही कारणास्तव पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.rmponweb.org/", "date_download": "2018-08-18T09:55:02Z", "digest": "sha1:5TGOMJMLKK6OLYJKHNC557TWCXE67I7K", "length": 29264, "nlines": 161, "source_domain": "www.rmponweb.org", "title": "Rambhau Mhalgi Prabodhini", "raw_content": "\nगुरुवार सभा, दि. ३० ऑगस्ट, २०१८ विषय: \"राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स (एन.आर.सी.) एक वास्तव\", वक्ते: माधव भांडारी , स्थान: १७ चंचल स्मृती, गं.द.आंबेकर मार्ग, वडाळा, मुंबई-३१, वेळ: सायं. ६.३० वाजता.\nशालेय ग्रंथपाल / साहाय्यक ग्रंथपाल क्षमता विकास कार्यशाळा दि. २०-२१ ऑक्टोबर, २०१८ स्थान : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, ज्ञान-नैपुण्य केंद्र, केशवसृष्टी, उत्तन, भाईंदर (प.\nराजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींसाठी, पुणे येथे नेतृत्व विकास कार्यशाळा (८-९ सप्टेंबर, ६-७ ऑक्टोबर, १७-१८ नोव्हेंबर २०१८)\nआर्य चाणक्य निबंध स्पर्धा ही सर्वसामान्य निबंध स्पर्धांपेक्षा नक्कीच वेगळी आणि विशेष होती कारण स्पर्\nरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी द्वारा आचार्य चाणक्य एक व्यवस्थापन गुरु (हिंदी भाषा) इस विषय पर लिखे मेरे न\nदिनांक ४-५ ऑगस्ट २०१८ रोजी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या संस्था बांधणी आणि नेतृत्व अध्ययन केंद्राद्वारे शालेय ग्रंथपाल संपन्नता कार्यशाळेचे पुणे येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शालेय ग्रंथपालांनी सहभाग घेतला होता.\nरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासकेंद्र ग्रंथालयाच्यावतीने दि. २८-२९ जुलै, २०१८ या कालावधीत सार्वजनिक ग्रंथालयातील पदाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन करतांना भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य प्रवक्ता श्री. माधव भांडारी, डॉ. प्रतिभा गोखले, प्रबोधिनीचे कार्यकारी प्रमुख (प्रशासन / प्रकल्प) रवी पोखरणा, माजी ग्रंथालय, संचालक, महाराष्ट्र राज्य, डॉ. बा.ए.सनान्से, प्रबोधिनीच्या ग्रंथालयाचे, ग्रंथपाल दिलीप नवेले\nभारतीय लोकशाही नेतृत्व संस्थानाच्या २०१७-१८ या वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत आणि २०१८-१९ या वर्षाचा उद्घाटन समारंभ रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भाईंदर येथील छत्रपती शिवाजी सभागृहात दि. २ जुलै, २०१८ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने केंद्रीय - रस्ते, दळणवळण व नौकानयन मंत्री श्री. नितीनजी गडकरी आणि राज्यसभा खासदार डॉ. नरेंद्र जाधव , रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष खा. डॉ. विनय सहस्रबुद्धे आणि प्रबोधिनीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य हजर होते त्याची क्षणचित्रे.\nभारतीय लोकशाही नेतृत्व संस्थानाच्या २०१७-१८ या वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत आणि २०१८-१९ या वर्षाचा उद्घाटन समारंभ रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भाईंदर येथील छत्रपती शिवाजी सभागृहात दि. २ जुलै, २०१८ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने केंद्रीय - रस्ते, दळणवळण व नौकानयन मंत्री श्री. नितीनजी गडकरी आणि राज्यसभा खासदार डॉ. नरेंद्र जाधव , रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष खा. डॉ. विनय सहस्रबुद्धे आणि प्रबोधिनीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य हजर होते त्याची क्षणचित्रे.\nरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि गांधी स्मृती दर्शन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संयोजन साहाय्य : राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, गायडिंग सोल्स बाल सुधारगृह कर्मचाऱ्यांसाठी तणाव व्यवस्थापन कार्यशाळा दि. २५-२६ जून, २०१८\nदिनांक १५-१६-१७ जून २०१८ रोजी, डोंबिवली येथील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिक्षकांसाठी क्षमता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनिच्या वतिने करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी बोलताना संस्थेच्या अध्यक्षा डॉ. प्रा. शुभदा जोशी. डावीकडून सौ. भावना लेले, श्री. श्रीकांत पावगी, श्री. आशिर्वाद बोंद्रे आणि प्रबोधिनीचे पुणे कार्यालय अधीक्षक श्री. राहुल टोकेकर\nदि. २-३ जून, २०१८ सामाजिक संस्थांसाठी सी.एस.आर. कार्यशाळा, या कार्यशाळेचे उद्घाटन करतांना प्रबोधिनीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य अरविंद रेगे आणि श्रीराम पटवर्धन\nश्री. रवींद्र माधव साठे यांची प्रबोधिनीच्या महासंचालक पदी नियुक्ती झाली त्यानिमित्त २६ मे, २०१८ रोजी अभिनंदन सोहळा पार पडला त्याचे क्षणचित्र.\nदि. १६-१७-१८ मे, २०१८ या कालावधीत जन अभियान परिषद, मध्य प्रदेश ग्रामविकास दिशा उद्बोधन शिबिर योजण्यात आले आहे. या शिबिराचे दि. १६ मे, रोजी उद्घाटन संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन करतांना प्रबोधिनीच्या सर्वसाधारण सभेचे सदस्य विवेक अत्रे, प्रकल्प, कार्यक्रम व प्रशासन प्रमुख रवी पोखरणा या शिबिरातील सत्राचे मार्गदर्शक रामभाऊ डिंबळे\nरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित संवाद सभा दि. ५-६ मे, २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. आज या संवाद सभेचा पहिला दिवस शनिवार, दि. ५ मे, रोजी संपन्न झाला. या संवाद सभेचे उद्घाटन जेष्ठ पत्रकार श्री. रमेश पतंगे, सुप्रसिद्ध अभिनेते श्री. सचिन खेडेकर, सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक श्री. सचिन कुंडलकर, संगीतज्ञ पं. सत्यशील देशपांडे, जेष्ठ पत्रकार, लेखक, कवी श्री. अंबरीश मिश्र, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक श्री. रवींद्र साठे, प्रबोधिनीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. अरविंद रेगे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सभेची काही क्षणचित्रे...\nरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित संवाद सभा दि. ५-६ मे, २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. आज या संवाद सभेचा पहिला दिवस शनिवार, दि. ५ मे, रोजी संपन्न झाला. या संवाद सभेचे उद्घाटन जेष्ठ पत्रकार श्री. रमेश पतंगे, सुप्रसिद्ध अभिनेते श्री. सचिन खेडेकर, सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक श्री. सचिन कुंडलकर, संगीतज्ञ पं. सत्यशील देशपांडे, जेष्ठ पत्रकार, लेखक, कवी श्री. अंबरीश मिश्र, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक श्री. रवींद्र साठे, प्रबोधिनीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. अरविंद रेगे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सभेची काही क्षणचित्रे...\nरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित, बुधवार-गुरूवार, दिनांक २-३ मे २०१८ रोजी दापोली एज्युकेशन सोसायटी, दापोली, जिल्हा रत्नागिरी येथे ए.जी. हायस्कूलच्या शिक्षकांसाठी \"क्षमता विकास प्रशिक्षण\" कार्यक्रमामध्ये उद्‍घाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या शाळासमितीच्या अध्यक्षा सौ. निलिमा देशमुख.\nरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे दिवंगत अध्यक्ष स्व. प्रमोद महाजन यांच्या पुण्यतिथी निमित्त ‘आपण अनुभवलेले प्रमोदजी’ या विषयावर मा. श्री. केशव उपाध्ये प्रवक्ते, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश यांचे व्याख्यान प्रबोधिनीच्या ज्ञान-नैपुण्य केंद्रात संपन्न झाले.\nरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने दि.६-७-८ एप्रिल, २०१८ या कालावधीत ‘महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना’ पदाधिकारी आणि कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करतांना संघटनेचे पदाधिकारी सुनील पाटणकर, बालाजी पवार, प्रबोधिनीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य अरविंद रेगे आणि प्रबोधिनीच्या पुणे कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक राहुल टोकेकर\nयशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दिनांक ९ एप्रिल २०१८ रोजी, खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे आणि निती आयोगाचे सदस्य श्री. धीरज नय्यर लिखित “The Innovation Republic - Governance Innovations in India under Narendra Modi” या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पुणे येथे संपन्न झाला. या प्रसंगी डावीकडून मा. श्री. अजय सावरीकर मा. श्रीमती प्रेरणा देशभ्रतार, यशदाचे महासंचालक मा. श्री. आनंद लिमये, मा. डॉ. विनय सहस्रबुद्धे, मा. श्री. धीरज नय्यर, म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष मा. प्रा. अनिरुद्ध देशपांडे आणि म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक मा. रवींद्र साठे\n“The Innovation Republic - Governance Innovations in India under Narendra Modi” या पुस्तकाचा प्रकाशन समारंभाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यपाल श्री. सी. विद्यासागर राव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपले मनोगत व्यक्त केले.\nदि. २९-३०-३१ मार्च, २०१८ या कालावधीत अंत्योदय : दिशादर्शन शिबिर संपन्न झाले. या शिबिरात १३ राज्यातून १२२ प्रतिनिधी सहभागी झाले.\nदि. २९-३०-३१ मार्च, २०१८ अंत्योदय : दिशादर्शन शिबिराचे उद्घाटन करतांना रवींद्र साठे, डॉ. महेशचंद्र शर्मा, भिकूजी (दादा) इदाते, अरविंद रेगे\nदि. २९-३०-३१ मार्च, २०१८ अंत्योदय : दिशादर्शन शिबिराचे उद्घाटन करतांना डॉ. महेशचंद्र शर्मा, भिकूजी (दादा) इदाते, अरविंद रेगे, रवींद्र साठे\nसोमवार, दि. २६ मार्च, २०१८ रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित आणि डी.एच.गोखले आणि श्यामला गोखले धर्मादाय न्यास पुरस्कृत अंत्योदय पुरस्कार – २०१८ यंदाच्या वर्षी परिवर्तन महिला संस्थेच्या वर्षा परचुरे यांना प्रदान करण्यात आला. सत्कारमूर्ती : श्रीमती वर्षा परचुरे, कार्यक्रम अध्यक्ष : मा. डॉ. सतीश मोढ, मुख्य अतिथी : मा. आ. डॉ. नीलम गोऱ्हे\nशनिवार, दिनांक १७ मार्च २०१८ रोजी शिवसेना , पुणे शहर (कोथरुड, खडकवासला, कसबा विधानसभा मतदारसंघातील) पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर पुणे येथे आयोजित करण्यात आले होते.\nशनिवार, दिनांक १७ मार्च २०१८ रोजी शिवसेना , पुणे शहर (कोथरुड, खडकवासला, कसबा विधानसभा मतदारसंघातील) पदाधिकारी प्रशिक्षण शिबिरामध्ये संघटन कौशल्य या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. अरुणा कौलगुड\nदिनांक १०-११ मार्च २०१८ रोजी संस्था बांधणी आणि नेतृत्व अध्ययन केंद्राद्वारे \" राजकीय कार्यकर्त्यांसाठी सोशल मीडिया कार्यशाळा\" पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांचे सोशल मीडिया विभागाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nदिनांक १०-११ मार्च २०१८ रोजीच्या राजकीय कार्यकर्त्यांसाठी - सोशल मीडिया कार्यशाळेमध्ये वेब साईट, न्युज पोर्टल आणि ब्लॉग लेखन या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. क्षितिज पाटुकले\nरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदुत्व अध्ययन (परिचय) प्रमाणपत्र अभ्यासक्रम दि. ९-१०-११ मार्च, २०१८ रोजी भाईंदर येथील ज्ञान-नैपुण्य केंद्रात संपन्न झाला.\nगुरुवार सभा, दि. ३० ऑगस्ट, २०१८ विषय: \"राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स (एन.आर.सी.) एक वास्तव\", वक्ते: माधव भांडारी\nशालेय ग्रंथपाल / साहाय्यक ग्रंथपाल क्षमता विकास कार्यशाळा दि. २०-२१ ऑक्टोबर, २०१८\nसामाजिक संस्थांसाठी सी.एस.आर. कार्यशाळा दि. २-३ जून, २०१८\nरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदुत्व अध्ययन (परिचय) प्रमाणपत्र अभ्यासक्रम दि. ९-१०-११ मार्च, २०१८ रोजी भाईंदर येथील ज्ञान-नैपुण्य केंद्रात संपन्न झाला या अभ्यासक्रमातील काही क्षणचित्रे...\nसामाजिक संस्थांसाठी सी.एस.आर. कार्यशाळा दि. २-३ जून, २०१८ रोजी भाईंदर येथील ज्ञान-नैपुण्य केंद्रात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेतील काही क्षणचित्रे...\nसार्वजनिक ग्रंथालयातील पदाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा दि. २८-२९ जुलै, २०१८\nशालेय ग्रंथपाल संपन्नता - कार्यशाळा\nहिंदुत्व अध्ययन (परिचय) प्रमाणपत्र अभ्यासक्रम - दि. ३१ मार्च - २ एप्रिल २०१७ (उद्घाटन सत्र) - भाग-२\nहिंदुत्व अध्ययन (परिचय) प्रमाणपत्र अभ्यासक्रम - दि. ३१ मार्च - २ एप्रिल २०१७ (उद्घाटन सत्र) - भाग-१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/dr-anil-lachke-writes-health-article-editorial-page-121964", "date_download": "2018-08-18T10:58:05Z", "digest": "sha1:B5GDK65VEXOODRIHWBERURMYMDZSKQDH", "length": 22359, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "dr anil lachke writes health article in editorial page सर्दीवर औषध आहे का? | eSakal", "raw_content": "\nसर्दीवर औषध आहे का\nगुरुवार, 7 जून 2018\nवरकरणी साध्याच, पण तरीही बेचैन करणाऱ्या सर्दीवर प्रभावी ठरू शकेल असं रसायन संशोधकांनी शोधून काढलंय. हा प्रयोग यशस्वी झाला तर साध्या इनहेलरनं या ‘आगंतुक पाहुण्या’ला दोन दिवसांत हटवता येऊ शकेल, असा संशोधकांना विश्‍वास वाटतो.\nवरकरणी साध्याच, पण तरीही बेचैन करणाऱ्या सर्दीवर प्रभावी ठरू शकेल असं रसायन संशोधकांनी शोधून काढलंय. हा प्रयोग यशस्वी झाला तर साध्या इनहेलरनं या ‘आगंतुक पाहुण्या’ला दोन दिवसांत हटवता येऊ शकेल, असा संशोधकांना विश्‍वास वाटतो.\nकुणा शायरने म्हटलंय- ‘इस भरी गर्मी में कुछ सुकून आ जाये; तू आ जाए, या फिर मान्सून आ जाए’ मॉन्सून वेळेवर आला तर चांगलंच आहे; पण कधी कधी ऋतू बदलल्यामुळं बऱ्याच जणांना सर्दी होते. पन्नास-पाऊणशे वर्षांपूर्वी एखादी व्यक्ती कुठे शिंकली, तर आजूबाजूची मंडळी अपशकून झाला, असं मानायची. आता जर कुठे शिंक ऐकू आली तर कुणी तसं सहसा मानत नाही. मात्र याचा अर्थ असा नाही, की अंधश्रद्धा दूर झाली. याचा अर्थ एवढाच, की आता अनेक वेळा अनेक ठिकाणी शिंका ऐकू येतात. कारण प्रत्येक व्यक्तीला वर्षातून दोन-तीन वेळा आणि शालेय मुला-मुलींना चार ते सहा वेळा सर्दी होतेच. ‘सर्दीच्या शिंकेला अपशकून नसतो’, असं पूर्वीचे लोकही मानत असत. आता सर्दी ही इतकी ‘कॉमन’ झाली आहे की इंग्रजीतही सर्दीला ‘कॉमन कोल्ड’ म्हणून ओळखलं जातंय. जिथं गर्दी आहे, तिथं सर्दी ही असणारच’ मॉन्सून वेळेवर आला तर चांगलंच आहे; पण कधी कधी ऋतू बदलल्यामुळं बऱ्याच जणांना सर्दी होते. पन्नास-पाऊणशे वर्षांपूर्वी एखादी व्यक्ती कुठे शिंकली, तर आजूबाजूची मंडळी अपशकून झाला, असं मानायची. आता जर कुठे शिंक ऐकू आली तर कुणी तसं सहसा मानत नाही. मात्र याचा अर्थ असा नाही, की अंधश्रद्धा दूर झाली. याचा अर्थ एवढाच, की आता अनेक वेळा अनेक ठिकाणी शिंका ऐकू येतात. कारण प्रत्येक व्यक्तीला वर्षातून दोन-तीन वेळा आणि शालेय मुला-मुलींना चार ते सहा वेळा सर्दी होतेच. ‘सर्दीच्या शिंकेला अपशकून नसतो’, असं पूर्वीचे लोकही मानत असत. आता सर्दी ही इतकी ‘कॉमन’ झाली आहे की इंग्रजीतही सर्दीला ‘कॉमन कोल्ड’ म्हणून ओळखलं जातंय. जिथं गर्दी आहे, तिथं सर्दी ही असणारच कारण सर्दीची व्यथा बहुतांशी संसर्गजन्य आहे.\nसर्दीनं बेजार झालेली व्यक्ती शिंकली की तुषार दोन मीटरपर्यंत उडतात. कारण शिंक ताशी दीडशे किलोमीटर वेगाने बाहेर पडते. त्यात सर्दीचे कोट्यवधी विषाणू असतात. हे विषाणू हातावर आणि कपड्यावर पसरतात. किमान तीन-चार तास ते प्रभावी असतात. त्यामुळे शिंकणाऱ्यानं तोंडासमोर रुमाल धरणे गरजेचे असते. रुग्णाच्या आजूबाजूच्या लोकांनी हात आणि तोंड साबणानं स्वच्छ धुवायला पाहिजेत. गर्दीच्या जागी सर्दीच्या विषाणूंचा प्रादुर्भाव एखाद्या निरोगी व्यक्तीला होऊ शकतो. त्याच्या बोटाला चिकटलेले विषाणू नाक, डोळे, तोंड यांच्यामार्फत शरीरात प्रवेश करतात. मग त्याला दोन दिवसांत सर्दी होऊ शकते. माझ्या माहितीतील एका शालेय शिक्षकांना वर्षातून बऱ्याच वेळा सर्दी होते. कारण वर्गातील पन्नास विद्यार्थ्यांपैकी कुणी तरी त्यांना न कळत विषाणू ‘बहाल’ करत असतो. सार्वजनिक लिफ्टचे बटण, नोटा-नाणी, दरवाजाच्या कड्या, संगणकाचा की-बोर्ड, देवळातील घंटा, बस-लोकल ट्रेनमधील दांड्या अशा ठिकाणी सर्दीचे विषाणू असू शकतात. तेथून संसर्ग होणं शक्‍य असतं.\nसर्दीमुळे नाकातील अंतर्गत भाग हुळहुळून दुखतो. कफ आणि पाणी वाहणे, घसा खवखवणे, डोळे गुलाबी होऊन डबडबणे, डोकं आणि चेहरा दुखणे, कणकण वाटून कामात लक्ष न लागणं- अशा वरकरणी साध्याच; पण तरीही बेचैन करणाऱ्या त्रासामुळे सर्दीग्रस्त व्यक्ती हवालदिल होते. दोन नाकपुड्यांपैकी एक गच्च झाली की रुग्ण अस्वस्थ होतो. मग नाक मोकळं करण्याचेदेखील ड्रॉप्स मिळतात. (खरं तर आपलं नाक एकावेळी एकाच नाकपुडीने, आळीपाळीने श्वसन करीत असते, पण ते लक्षात येत नाही). आपल्याला सर्दी होते तेव्हा ‘रामबाण इलाज’ सुचवणारे अनेक लोक आढळतात. ‘आलं टाकून गवती चहा प्या, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा, छातीला आणि नाकाला बाम चोळा, नाकात गाईच्या तुपाचे थेंब सोडा, जलनेती करा, नाकात पाण्याची वाफ घ्या’ वगैरे वगैरे ऑक्‍युप्रेशरचे जाणकार ‘नाकपुड्यांच्या बाजूंना आणि मानेजवळील विशिष्ट ठिकाणी बोटाने दाब द्या,’ असं सांगतात. दक्षिण भारतातील लोक सर्दी झाल्यास घसा शेकत गरम ‘रसम्‌’चे सेवन करतात. काही सोपस्कार सर्दीग्रस्ताला थोडा-फार आराम देतात. त्याला अँटिॲलर्जीक आणि कफहारक गोळ्या, सौम्य वेदनाशामक औषधे दिली जातात. दोन वेळा ‘नोबेल’चे मानकरी झालेल्या प्रा. लायनस पॉलिंग यांनी सर्दीसाठी ‘व्हिटॅमिन सी’चा मोठा डोस देण्यास सुचवले होते. त्यामुळे सर्दीवर लवकर नियंत्रण मिळवता येते. पण तरीही ‘मान न मान, मैं तेरा मेहमान’ म्हणत सर्दी निदान आठवडाभर तरी मुक्काम करते. त्यामुळेच ‘औषध घेतलं तर सर्दी आठवडाभरात बरी होते आणि औषध घेतलं नाही, तर आठ दिवसांत बरी होते,’ असं गंमतीनं म्हटलं जातं. सध्याची उपचारपद्धती फक्त ‘लक्षणां’वर लक्ष केंद्रित करत आहे. सर्दी-खोकला आणि पडसे यामुळे जगभर विविध क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांचे अब्जावधी कामाचे तास वाया जातात. तसेच उपचारांवर खर्च होतो तो वेगळाच. हे लक्षात घेऊन संशोधकांनी सर्दीवर एखादी प्रभावी लस किंवा औषध तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले.\nसर्दीचे मुख्यत: ऱ्हायनो (म्हणजे नाक), करोना आणि रेस्पायरेटरी सिन्सियल या नावांचे तीन विषाणू (व्हायरस) आहेत. त्यातील ऱ्हायनो विषाणू प्रसाराच्या दृष्टीनं जास्त प्रभावी आहे. या विषाणूंचे काही उपप्रकार (स्ट्रेन्स) आहेत. त्यामुळे विविध व्हायरसचे दोनशे प्रकार उद्‌भवतात (आणि माशी इथंच तर शिंकलीये). यामुळे सर्दीच्या विषाणूला रोखण्यासाठी एकच लस किंवा औषध तयार करणं आव्हानात्मक आहे. साहजिकच जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचे प्रा. विन्स्टन प्राईस यांनी साठ वर्षांपूर्वी तयार केलेली लस निष्प्रभ ठरली होती.\nसर्दी हटवण्यासाठी लंडनच्या इंपिरियल कॉलेजमध्ये दीर्घकाळ संशोधन चालू आहे. नुकताच त्यांना त्यात ‘ब्रेकथ्रू’ मिळाला आहे. नवी पद्धत थेट रुग्णांच्या श्वसनसंस्थेतील विषाणूंचा बंदोबस्त करते. सर्दीच्या सर्व प्रकारच्या विषाणूंना त्यांचे बाह्य-आवरण घडवण्यासाठी एका महत्त्वपूर्ण प्रथिनाची गरज असते. त्याचं नाव आहे : ‘एन-मायरिस्टाइल ट्रान्फरेज (एनएमटी). याला जखडून ठेवणारे एक रसायन प्रा. एड टेट यांच्या टीमनं शोधून काढलंय. सर्दीला सुरवात झाली, की ते लगेचच घेतलं तर जास्त परिणामकारक आहे. सर्दीच्या विषाणूला ते ‘ग्रहण’ करता येत नाही. साहजिकच बाह्य-आवरणाअभावी विषाणूंची संख्या झपाट्यानं कमी होऊ लागते. उरलेल्या विषाणूंना व्यक्तीची प्रतिकारशक्ती नेस्तनाबूत करते. या औषधाचे जैवरसायन शास्त्रीय आणि वैद्यकीय परीक्षण चालू आहे. या औषधाचे व्यावसायिक तत्त्वावर उत्पादन होणार असल्याने तूर्त त्याचे नाव ‘आयएमपी- १०८८’ ठेवले आहे. हे तत्त्व वापरून दमा आणि हिवतापाचं औषधही तयार करता येईल. हा प्रयोग यशस्वी झाला तर साध्या हुंगण्याच्या नळीनं (इनहेलर) सर्दीसारख्या आगंतुक ‘मेहमाना’ला दोन दिवसांत हटवता येईल, असा विश्वास संशोधकांना वाटत आहे. शिंक कधी कधी शिंक देणाऱ्याला हुलकावणी देते. आता शिंकेलाच हुलकावणी देणारे औषध तयार झालंय. बघूया, कोण कोणाला हुलकावणी देतो ते\nसंयुक्त राष्ट्रांच्या माजी महासचिवांचे निधन\nसंयुक्त राष्ट्रसंघ- संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण महासभेचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन झाले आहे. 8 एप्रिल 1938 रोजी त्यांचा घाना या देशात...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nजिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांची मुलाखत\nलोणी काळभोर - माथाडी माफिया, लॅन्ड माफिया, सॅऩ्ड माफिया, खाजगी सावकारांच्या बरोबर कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहचवणाऱ्यांना वठणीवर आनण्यासाठी तडीपारी...\nकोल्हापुरात एक नवी ‘डावी’ चळवळ\nकोल्हापूर - कोल्हापुरात डावी चळवळ सक्रिय आहेच; पण आणखी एक नवी डावी चळवळ कोल्हापुरात उभी रहात आहे. आणि ही चळवळ फक्त डावखुऱ्या (कोल्हापुरी भाषेत...\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-corporator-meeting-matoshri-53245", "date_download": "2018-08-18T10:46:59Z", "digest": "sha1:2NPR7PDSGUL4BV3OAIV3ESV6VATRF3V5", "length": 10897, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news corporator meeting on matoshri नगरसेवकांची आज 'मातोश्री'वर झाडाझडती | eSakal", "raw_content": "\nनगरसेवकांची आज 'मातोश्री'वर झाडाझडती\nशनिवार, 17 जून 2017\nमुंबई - महापालिकेत पावलोपावली भाजप शिवसेनेची कोंडी करीत असून, पक्षांतर्गतही धुसफूस वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नगरसेवकांची स्वत: झाडाझडती घेणार आहेत. \"मातोश्री'वर शनिवारी (ता.17) सकाळी 11 वाजता नगरसेवकांची बैठक होणार आहे.\nमुंबई - महापालिकेत पावलोपावली भाजप शिवसेनेची कोंडी करीत असून, पक्षांतर्गतही धुसफूस वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नगरसेवकांची स्वत: झाडाझडती घेणार आहेत. \"मातोश्री'वर शनिवारी (ता.17) सकाळी 11 वाजता नगरसेवकांची बैठक होणार आहे.\nशिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांच्या संख्येत फार मोठा फरक नाही. त्यामुळे प्रत्येक पावलावर भाजप शिवसेनेला अडचणीत आणत आहे. शिवसेनेचे अनेक प्रस्ताव भाजपमुळे रखडले आहेत. भाजप आक्रमक भूमिका घेत असताना शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस वाढली आहे.\nपालिकेतील नेत्यांमध्येच संवाद नसल्याने अनेक वेळा स्थायी समितीत शिवसेनेची अडचण होते. अशा तक्रारी \"मातोश्री'वर आल्या आहेत. हा अंतर्गत कलह पक्षाला अडचणीत आणणारा असल्याने ठाकरे यांनी सर्व नगरसेवकांची झाडाझडती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मातोश्रीवर होणाऱ्या बैठकीत नगरसेवकांनी केलेल्या कामांचा आढावा घेण्यात येणार आहे.\nMaratha Kranti Morcha : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री आंदोलन\nपुणे : मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे सोमवारपासून (ता.20) मराठा आरक्षणासाठी आणि विविध मागण्यांसाठी पुणे विभागीय आयुक्त...\nएमआयएम नगरसेवक मतीन यांना अटक\nऔरंगाबाद- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला नकार देणारे औरंगाबादमधील एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना आज अटक करण्यात...\nभाषणात मोठी ताकद आहे.. : बबन साळगांवकर\nसावंतवाडी : भाषणात मोठी ताकद आहे त्याच वक्तृत्वाचा फायदा घेऊन तब्बल 23 दिवसांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे पहिल्यांदा आमदार बनले आणि त्यांनी नंतर...\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/bjp-promises-false-promises-ashok-pawar-121635", "date_download": "2018-08-18T10:59:07Z", "digest": "sha1:TACA7TTHKWLMCAFHNVGWTP7VJKNVRZDK", "length": 16043, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP promises false promises - Ashok Pawar भाजपाने सत्तेवर आल्यापासून जनतेला खोटी आश्वासने दिली - अशोक पवार | eSakal", "raw_content": "\nभाजपाने सत्तेवर आल्यापासून जनतेला खोटी आश्वासने दिली - अशोक पवार\nमंगळवार, 5 जून 2018\nलोणी काळभोर - भारतीय जनता पक्षाने सत्तेवर आल्यापासून जनतेला खोटी आश्वासने दिली आहेत. त्यामुळे नियोजनशून्य व फसव्या सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत माजी आमदार अशोक पवार यांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे व्यक्त केले.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन व १० जून २०१८ रोजी पुणे येथे होणाऱ्या हल्लाबोल आंदोलनाच्या सांगता सभेनिमित्त पक्षातर्फे पूर्व हवेलीमध्ये गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुंजीरवाडी येथे झालेल्या बैठकीत पवार यांनी आपले मत मांडले.\nलोणी काळभोर - भारतीय जनता पक्षाने सत्तेवर आल्यापासून जनतेला खोटी आश्वासने दिली आहेत. त्यामुळे नियोजनशून्य व फसव्या सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत माजी आमदार अशोक पवार यांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे व्यक्त केले.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन व १० जून २०१८ रोजी पुणे येथे होणाऱ्या हल्लाबोल आंदोलनाच्या सांगता सभेनिमित्त पक्षातर्फे पूर्व हवेलीमध्ये गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुंजीरवाडी येथे झालेल्या बैठकीत पवार यांनी आपले मत मांडले.\nगावभेट दौऱ्यामध्ये पूर्व हवेलीतील कोलवडी, थेऊर, कुंजीरवाडी, नायगाव, पेठ, कोरेगाव मुळ, उरुळी कांचन, शिंदवणे, वळती या गावांमध्ये बैठका घेण्यात आल्या. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदिप कंद, राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नंदू काळभोर, महिलाध्यक्षा लोचन शिवले, पंचायत समिती सदस्या कावेरी कुंजीर, सरपंच अनुराधा कुंजीर, माजी सरपंच सचिन तुपे, जिल्हा सरचिटणीस दिलीप वाल्हेकर, युवक उपाध्यक्ष संतोष कुंजीर, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष राजेंद्र चौधरी, शिवदीप उंद्रे, पर्यावरण संरक्षण समितीचे अध्यक्ष संजय जगताप उपस्थित होते.\nयावेळी अशोक पवार म्हणाले,\"भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सत्तेवर आल्यापासून शेतकरी, उद्योजक, कामगार व समाजातील सर्वच घटकांना केवळ आश्वासनांचे गाजर दाखवले आहे. शेतकऱ्यांच्या शेतमाला योग्य हमीभाव देण्यासाठी या सरकारने कुठलेच उपाय केल्याचे दिसून येत नाही, याउलट विविध योजनांच्या नावाखाली सामान्य माणसाच्या खिश्याला कात्री लावली आहे. या सरकारकडून विकासाच्या नावाखाली आश्वासनांचा भडिमार सुरु असून पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने मध्यम वर्गाची लुट चालवली आहे. शिरूर-हवेली तालुक्यातून प्रथम सरू केलेल्या शिरपूर पॅटर्न, दारिद्र रेषेखालील कुटुंबांना वैद्यकीय मदत, शुद्ध पाणीपुरवठा प्रकल्प अशा विविध योजनांना भाजपा सरकारने नाव बदलून स्वत:च्या नावाने पुढे चालविल्या आहेत.\"\nयावेळी प्रदिप कंद म्हणाले, \"समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजकारण्यांनी एकत्र येवून प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या भारतीय जनता पक्षाच्या कारभारावर समाजातील सर्व घटक नाराज आहेत, त्यामुळे सत्ता परिवर्तनासाठी मतदारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सहकार्य करावे.\"\nपर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण -\nदरम्यान, जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कुंजीरवाडी येथील पर्यावरण संरक्षण समितीच्या वतीने माजी आमदार अशोक पवार व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदिप कंद यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.\nसंयुक्त राष्ट्रांच्या माजी महासचिवांचे निधन\nसंयुक्त राष्ट्रसंघ- संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण महासभेचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन झाले आहे. 8 एप्रिल 1938 रोजी त्यांचा घाना या देशात...\nसिद्धूचे पाक लष्करप्रमुखांना अलिंगन\nनवी दिल्ली : पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला काँग्रेसचे नेते व भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांना खास आमंत्रण होते....\nMaratha Kranti Morcha : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री आंदोलन\nपुणे : मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे सोमवारपासून (ता.20) मराठा आरक्षणासाठी आणि विविध मागण्यांसाठी पुणे विभागीय आयुक्त...\nएमआयएम नगरसेवक मतीन यांना अटक\nऔरंगाबाद- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला नकार देणारे औरंगाबादमधील एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना आज अटक करण्यात...\nभाषणात मोठी ताकद आहे.. : बबन साळगांवकर\nसावंतवाडी : भाषणात मोठी ताकद आहे त्याच वक्तृत्वाचा फायदा घेऊन तब्बल 23 दिवसांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे पहिल्यांदा आमदार बनले आणि त्यांनी नंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/bacchu-kadu-sentenced-1-yr-imprisonment-1618573/", "date_download": "2018-08-18T11:10:53Z", "digest": "sha1:LBMWFPEVGGHILDYHVHVTMFZIUV4EOAU7", "length": 15854, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bacchu Kadu sentenced 1 yr imprisonment | प्रहारी मार्गाना वेसण | Loksatta", "raw_content": "\nबेशिस्त वाहनचालकांना ९१ लाखांचा दंड\nपक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा\nपुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित\nजळगावमध्ये महाजन-खडसे गटबाजीची सर्वत्र बाधा\nएमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल\nकिमान कायदे तयार करणाऱ्यांचे वर्तन तरी कायद्याला धरून असावे असे लोकशाहीत अपेक्षित असते.\nकिमान कायदे तयार करणाऱ्यांचे वर्तन तरी कायद्याला धरून असावे असे लोकशाहीत अपेक्षित असते. त्याला सुरुंग लावण्याचे काम अचलपूरचे आमदार बच्चू कडू सातत्याने करीत आले आहेत. त्यांना बुधवारी न्यायालयाने सुनावलेली कैद हा अपेक्षाभंगाचा सज्जड पुरावाच आहे. उत्तरेकडील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील राजकारण सभ्य व सुसंस्कृत असल्याच्या समजाला छेद देण्याचे काम या शिक्षेने केले आहे. याआधी उमरेडचे आमदार सुधीर पारवे यांना, एका शिक्षकाला मारहाण केल्याबद्दल दोन वर्षांची शिक्षा झाली होती. ते प्रकरण वरच्या न्यायालयात तडजोडीने मिटले, पण लोकप्रतिनिधींच्या वर्तनावर लागलेला कलंक मात्र कायम राहिला. विधिमंडळात लोकशाहीचे गोडवे गायचे आणि बाहेर मात्र तिला पायदळी तुडवायचे. असले प्रकार बच्चू कडू सातत्याने करीत आले आहेत. मंत्रालयापासून ते जिल्हा व तालुका स्तरावरील कार्यालयापर्यंत त्यांनी अनेकदा हात उगारला आहे. ‘असे केल्याशिवाय लोकांची कामेच होत नाहीत’, असा मुलामा ते असल्या बेकायदा कृत्यांना देत असतात व यातून लोकप्रियता मिळते असा त्यांचा भाबडा() समज आहे. ते पराभूत होईपर्यंत तरी हा समज कायम राहील असे सध्याचे चित्र असले तरी निकोप लोकशाहीसाठी हा प्रकार घातक आहे. वाढत्या अपघातांमुळे संतप्त होऊन पोलीस शिपायाला मारहाण करणाऱ्या बच्चू कडूंना या घटनेनंतर अपघाताचे प्रमाण घटले का, असा प्रश्न कुणीच विचारला नाही. त्यामुळेच ते सतत हिंसेचे समर्थन करणारी प्रमेये मांडत असतात व शिक्षा झाल्यावरसुद्धा लोकांच्या हितासाठी असा प्रहारी लढा सुरूच राहील, असेही म्हणत असतात. आजकाल कुणाही राजकारण्याला शिक्षा झाली की, मग गरिबांवरील अन्याय आठवतो. बच्चू कडूसुद्धा आता याच पंक्तीत जाऊन बसले आहेत. सामान्य जनतेचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी तसेच प्रशासनातील दिरंगाई, भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी व्यवस्थेने अनेक कायदेशीर मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. आमदार असलेल्या बच्चू कडूंजवळ तर या मार्गासोबतच विशेषाधिकाराचे कवचसुद्धा आहे. तसे करण्याऐवजी थेट कायदा हातात घेणे यालाच ते प्रमुख आयुध समजत असतील तर ते चूकच. बच्चू कडूंना मतदारसंघात लोकप्रिय असल्याचा मोठा अभिमान आहे. मात्र, कायद्याच्या कोंदणात न बसणारी अशी लोकप्रियता बरेचदा तकलादू असते याचे भान अजून त्यांना आलेले नाही. लोकप्रतिनिधींनी लोकांची कामे करण्यासोबतच समाजापुढे आदर्श निर्माण होईल अशी कृती करणेसुद्धा अपेक्षित असते; परंतु हिंसक कार्यपद्धतीतून कडू नेमका कोणता आदर्श निर्माण करत आहेत, असा प्रश्न या शिक्षेच्या निमित्ताने पुन्हा उपस्थित झाला आहे. संतापाच्या भरात घडलेली कृती एखादवेळी माफ करता येईल, पण कडूंकडून सातत्याने होत असलेले हिंसेचे तोंडी समर्थन काही निराळेच सांगते. अन्यायाविरुद्ध प्रहार करण्यासाठी प्रहार नावाची संघटना चालविणारे कडू हे प्रहार म्हणजे जणू प्रत्यक्ष ठोसाच आहे, असे वागत असल्याचे या निकालानंतर म्हणता येते. लोकप्रियता मिळवण्यासाठी हाच एकमेव व सोपा मार्ग आहे असा समज या आमदाराने करून घेतला असेल तर ते अजूनही मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत असे खेदाने नमूद करावे लागते. अभ्यासू, प्रामाणिक, कायद्याचा आदर करणारे व चर्चेतून प्रश्न सोडवण्यावर गाढा विश्वास असलेले असंख्य लोकप्रतिनिधी या राज्याने बघितले आहेत. त्याऐवजी बालिश प्रहारी मार्ग वापरणारे आमदार असतील, तर न्यायालयाची त्यांना वेसण हवीच.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n पिंपरीत पित्याने दोन मुलांची हत्या करुन केली आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nIt's Official: नात्यावर शिक्कामोर्तब करत अखेर निक-प्रियांका म्हणाले....\nसहजीवनाचा पहिला टप्पा सर, थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा\nइम्रान खानच्या शपथविधीला सिद्धूंना मानाचे स्थान, घेतली लष्करप्रमुखांची गळाभेट\nमिनी एसयुव्हीसारखं डिझाईन असलेली नवीन रेनाँ क्विड वसूल करते तुमचा पै न पै\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nअंतर्गत वाहतुकीसाठी ट्रामचा पर्याय\nवाहनांना एक टोल माफ\nरेल्वेचे संगणकीय आरक्षण केंद्र पावणेतीन तास बंद राहणार\nस्वानंद देणारे शिक्षण निवडा\nवामनदादा कर्डकांना शाहिरीतून अभिवादन\nभूगावमधील हॉटेलमध्ये कोंबडय़ांच्या झुंजीवर जुगार\nपाणी पुरेना आणि म्हणे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-18T10:53:16Z", "digest": "sha1:BO7BXZBFO57JDMGKJU5PQNYAYNSJFCGG", "length": 7930, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "केजरीवाल यांच्या कार्यालयाने चहापानावर केला एक कोटींपेक्षा जास्त खर्च | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकेजरीवाल यांच्या कार्यालयाने चहापानावर केला एक कोटींपेक्षा जास्त खर्च\nनवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आता पुन्हा एकदा टीकाकारांच्या निशाण्यावर आले आहेत. कारण सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कार्यालयाने चहा-पानावर 1 कोटी 3 लाख 4 हजार 162 रूपये खर्च केला आहे. हल्द्वानीचे आरटीआय कार्यकर्ते हेमंत सिंह गोनिया यांनी फेब्रुवारी महिन्यात यासंदर्भात आरटीआयअंतर्गत माहिती मागविली होती. या आरटीआयअंतर्गत ही माहिती समोर आली आहे.\nआरटीआयतून समोर आलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2015-2016मध्ये चहा-पानावर कार्यालयाने 23.12 लाख रुपये खर्च केले. 2016-17मध्ये 46.54 लाख रूपये तर आर्थिक वर्ष 2017-18मध्ये चहा-पानावर 33.36 लाख रुपये खर्च करण्यात आला. 2016मधील 47.29 लाख रुपयातील 22 लाख 42 हजार 320 रुपयांचं बील सचिवालय कार्यालय आणि 24 लाख 86 हजार 921 रुपयाचं बील कॅम्प ऑफिसमध्ये आलं. दरम्यान, या प्रकरणावर मुख्यमंत्री कार्यालयातून काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.\nमुख्यमंत्री कार्यालयातील अशा प्रकारच्या खर्चावर लगाम लावणं गरजेचं आहे. ज्या लोकांना जेवळही मिळण मुश्किल आहे अशांवर हा पैसा खर्च करायला हवा. चांगल्या कामासाठी सरकार आपल्या खर्चात कपात करेल याचा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया आरटीआय कार्यकर्ते गोनिया यांनी दिली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरेल्वे अपघातात दोघांचा मृत्यू\nNext articleखरीप हंगामासाठी खते व बियाणांच्या पुरवठ्याचे योग्य नियोजन करावे – गिरीश बापट\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा केरळ दौरा, ५०० कोटी रुपयाची मदत जाहीर\nकेरळमध्ये उद्भवलेल्या पूरग्रस्त परिस्थितीस राष्ट्रीय आपत्ती घोषित करा: राहुल गांधी\nविहिरीत सापडला शेतकऱ्याचा मृतदेह\nकेरळच्या मदतीस सरसावले अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, या राज्यांनी केली ‘एवढी’ मदत\nनिम्म्या कर्नाटकवर दुष्काळाचे सावट; मात्र काही भागांत पूरस्थिती\nकाश्‍मीरमधील ग्रेनेड हल्ल्यात एकाचा मृत्यूू, तिघे जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A/", "date_download": "2018-08-18T10:56:00Z", "digest": "sha1:GQYSC7IS4DEOZHLZFMTZGZIHQOMW3L2C", "length": 15653, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "आरक्षण संपवण्याचा सरकारचा डाव हाणून पाडा – छगन भुजबळ - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे…\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची…\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Maharashtra आरक्षण संपवण्याचा सरकारचा डाव हाणून पाडा – छगन भुजबळ\nआरक्षण संपवण्याचा सरकारचा डाव हाणून पाडा – छगन भुजबळ\nमुंबई, दि. २१ (पीसीबी) – आरक्षण संपवणे हा सरकाचा डाव आहे, हा डाव यशस्वी होऊ देऊ नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना केले. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यावेळी भुजबळ बोलत होते.\nयावेळी भुजबळ म्हणाले की, कुणालाही न घाबरता लोकांच्या मदतीसाठी उभे राहा, स्वतःला झोकून द्या. अनेक आंदोलनांमध्ये मलाही अटक झाली पण मी डगमगलो नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. दर वेळी कायदा हातात घेतला पाहिजे असे नाही. मात्र ‘घी सिधी उँगलीसे नहीं निकले तो उँगली टेढी करनी चाहिये’ हे सूत्र लक्षात ठेवा असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले\nहिंमत हरू नका म्हणत भुजबळ म्हटले, ”कश्ती तो उनकी डुबती हैं जिनके इमान डगमगाते हैं जिनके दिलमें नेकी होती है उनके आगे मंजिलेभी सर झुकाती है” आंदोलन करण्याच्या आधी डगमगून जाऊ नका. तुरुंगात गेलो तर सोडवतील कसे याची चिंता बाळगू नका लोकांचे प्रश्न हिरिरीने मांडा तर लोक तुम्हाला साथ देतील असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.\nPrevious article…म्हणून राहुल गांधींनी माझी गळाभेट घेतली – पंतप्रधान मोदी\nNext articleपिंपरी महापालिकेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना वेतन फरकाची रक्कम द्या – उच्च न्यायालय\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घाेषणा\nहिम्मत होती तर एकेकाने यायचे होते मग दाखवले असते; औरंगाबादेतील एमआयएम नगरसेवकाचा माज\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nराहुल गांधी देशभरातील १५०० प्राध्यापकांशी संवाद साधणार\nअजित पवारांनी ‘ते’ मनाला लावून का घेतले\nऔरंगाबादमध्ये माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवकाला...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n‘खड्डे बुजविण्यासाठी याचिका दाखल करण्याची वेळच का येते,’ – उच्च न्यायालय...\nमराठा आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा लांबणीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-18T10:56:03Z", "digest": "sha1:E4AF4ARPNIHBV5YW4OJ3EY7T64WBLA2Y", "length": 16930, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना महापूजा करू देणार नाही - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे…\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची…\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Maharashtra पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना महापूजा करू देणार नाही\nपंढरपुरात मुख्यमंत्र्यांना महापूजा करू देणार नाही\nनाशिक, दि. २० (पीसीबी) – ‘मराठा क्रांती मोर्चातर्फे काढण्यात आलेले लाखोंचे मोर्चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने दुर्लक्षित केले असून, दोन दिवसात मराठ्यांच्या मागण्यांबाबत काही लेखी निर्णय न घेतल्यास पंढरपुरात आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महापूजा करू दिली जाणार नाही,’ अशी भूमिका सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे घेण्यात आली आहे. अशा मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा काही अधिकार नसून, त्यांनी पायउतार व्हावे, अशी मागणी क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. पंढरपूरसाठी नाशिकमधून अनेक तरुण रवाना होणार असून, मुख्यमंत्र्यांना महापूजा करू न देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.\nमराठा मोर्चाविषयी विधीमंडळ अधिवेशनात कुणीही आमदार चकार शब्द काढत नाही त्यामुळे सर्व आमदारांचा निषेध करीत असून, यापुढे आमदारांना गावबंदी करणार असल्याचेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठलाच्या महाआरतीचा मान मुख्यमंत्र्यांना देण्यात येतो. परंतु, यंदाच्या वर्षी मुख्यमंत्र्यांना ही पूजा करू दिली जाणार नाही, अशी भूमिका मराठा मोर्चातर्फे घेण्यात आली आहे. मराठा समाजाचे अनेक मुलभूत प्रश्न आहेत ते सुटावेत यासाठी काढण्यात आलेले ५८ मूक मोर्चे सरकारने दुर्लक्षित केले. मराठा आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा त्यात होता; मात्र मुख्यमंत्र्यांनी १६ टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला. ते आम्हाला नको आहे, अशी भूमिकाही यावेळी घेण्यात आली.\nपंढरपुरात मुख्यमंत्र्यांना महापूजा करू देणार नाही\nPrevious articleपिंपरी महापालिकेच्या एका महिला कर्मचाऱ्याला लोकप्रतिनिधी देताहेत मानसिक त्रास; पतीचा आरोप\nNext articleस्कूलबस, खासगी वाहतूकदार आज देशभरात एकदिवसीय संपावर\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घाेषणा\nहिम्मत होती तर एकेकाने यायचे होते मग दाखवले असते; औरंगाबादेतील एमआयएम नगरसेवकाचा माज\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nजातीनिहाय आरक्षणात कोणतेही बदल केले जाणार नाहीत – पंतप्रधान मोदी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय १५ ऑगस्ट पासून ऑटो क्लस्टर येथून कार्यान्वित होणार\nआमदार विनायक मेटेंचा नातेवाईक असल्याचे सांगून पोलिस निरीक्षकाला घातला ६ लाखांचा...\nआता फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कैद्यांना कारागृहातून कुटुंबीयांशी फोनवर बोलता येणार\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n…तर शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होईल – उध्दव ठाकरे\nभांडूपमध्ये शाळकरी मुलाची शाळेबाहेरच धारदार शस्त्राने वार करुन हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://swarjoshi.blogspot.com/2010/06/blog-post_16.html", "date_download": "2018-08-18T10:04:14Z", "digest": "sha1:APCBXHTNRX3OV3SLCIYO3NKGIVDKOOP2", "length": 7559, "nlines": 105, "source_domain": "swarjoshi.blogspot.com", "title": "yogesh joshi: तिळा तिळा दार उघड ....", "raw_content": "\nबुधवार, 16 जून 2010\nतिळा तिळा दार उघड ....\nशरीरावरील तिळ आणि तुमचे भाग्य\nतिळा तिळा दार उघड .... आठवलं काही हो त्या परवलीच्या शब्दा नंतर गोष्टीतील अलीबाबाचं भाग्य उजळतं,\nपण आपल्या शरीरावर असणार्‍या तिळाने तुमच्या भाग्याचे दरवाजे कशे उघडणार हे मात्र कळू शकतं. आपल्या शरीरावर कीती तिळ आहेत हे कधी तपासा आणि त्याचा तुमच्या भाग्याशी असणारा संबंध बघा....\nशरीर वर तिळ ----- त्याचे फळ\nकपाळावर --------- बलवान असाल.\nहनुवटीवर-------- स्त्रीशी प्रेम कमी.\nभुवयांच्यामध्ये-- प्रवास होत रहातील.\nउजव्या डोळ्यावर ---- स्त्रीशी प्रेम.\nडव्या डोळ्यावर---- स्त्रीशी कलह.\nउजव्या गालावर----- धनवान होइल.\nडव्या गालावर------ खर्च वाढत जाइल.\nओठांवर---------- विषय-वासना यात गुंतुन राहील.\nकानावर---------- अल्पायु होण्याची शक्यता.\nउजव्या हातावर----- मान-प्रतिष्ठा मिळेल.\nडव्या हातावर------ भांडखोर स्वभाव राहील.\nनाकावर---------- यात्रा प्रवास होतील.\nउजव्या छाती वर----- स्त्रीशी प्रेम राहील.\nडव्या छाती वर------ स्त्रीशी भांडणे होतील.\nकमरेवर----------- आयुष्य त्रासात जाईल.\nदोन्हीं छातीच्या मध्ये---जीवन सुखी रहील.\nपोटावर---------- उत्तम भोजनसाठी इच्छुक.\nउजव्या तळव्यावर------ बलवान होइल.\nडव्या तळव्यावर------ खूप खर्च करेल.\nउजव्या हातच्या पाठी-- धनवान होइल.\nडव्या हाताच्या पाठी---कमी खर्च करा.\nडव्या पायावर --- खर्च अधिक होइल.\nप्रस्तुतकर्ता yogesh joshi पर 6:16 am\nमाझ्या उजव्या खांद्यावर एकाच जागी दोन, डाव्या कमरेवर एक आणि डाव्या दंडावर एक तीळ आहेत\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nप्रभावी स्तोत्र व मंत्र\nतिळा तिळा दार उघड ....\nकरिअर मध्ये सफलता गुण व ग्रहयोग यांचा संबंध\nव्यवसाय प्रगति, नोकरी मध्ये प्रमोशन व ग्रहयोग (You...\nसमाज कार्य हा काही धंदा नाही की राजकारणात जाण्याची शिडी नाही.ज्या समाजात आपण राहातो त्या समजाचे आपण काही देणे लागतो याचे भान ठेऊन आवडीने समाज कार्य करत आहे.\nमेरा पूरा प्रोफ़ाइल देखें\nऑसम इंक. थीम. molotovcoketail के थीम चित्र. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/challenges-complete-fifa-123089", "date_download": "2018-08-18T10:44:25Z", "digest": "sha1:UUMOJXJBPCHV6DSNJK5OXVE4XD5SJAS2", "length": 12361, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "CHALLENGES TO COMPLETE THE FIFA \"फिफा'समोर आव्हानांचा डोंगर | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 12 जून 2018\n-पुढील स्पर्धेपासून संघांची संख्या 48 करणे\n-दक्षिण अमेरिकन संघटनांकडून पुढील वर्षापासून खरंच हे शक्‍य आहे का याची पडताळणी करण्याची सूचना\n-2026च्या यजमानपदाचा निर्णय. मोरोक्कोखेरीज अमेरिका, कॅनडा आणि मेक्‍सिको यांची एकत्रित निविदा\n-प्रशासक समितीने पाठविलेल्या नव्या मानांकन पद्धतीच्या प्रस्तावर चर्चा करून मान्यता देणे\nमॉस्को -\"फिफा' विश्‍वकरंडक आता दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना होणाऱ्या दोन दिवसांच्या \"फिफा'च्या बैठकीत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा आणि निर्णय अपेक्षित आहेत.\nफुटबॉल स्पर्धेचा आवाका आणि लोकप्रियता लक्षात घेता \"फिफा' आणि अध्यक्ष इन्फॅनटिनो यांच्यासमोर आव्हानांचा डोंगरच उभा राहणार आहे. यापुढील विश्‍वकरंडक स्पर्धा 48 संघांत घेण्याचा मुख्य मुद्दा या बैठकीत ऐरणीवर राहणार आहे. यापुढील म्हणजेच 2022च्या स्पर्धेपासूनच हा निर्णय अमलात यावा, यासाठी बैठकीत आग्रह होण्याची शक्‍यता आहे.\nया संदर्भात रविवारी झालेल्या पहिल्या बैठकीत \"फिफा'ने या संदर्भात पुढील स्पर्धा संयोजक कतारशी चर्चा करण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे बैठकीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी या प्रश्‍नाचे उत्तर मिळेल असे मानले जात आहे.\nयाच बैठकीत 2026 मधील स्पर्धेच्या यजमानपदाचा देखील निर्णय होईल. त्यासाठी मतदान होण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर \"फिफा'च्या जागतिक क्रमवारीसाठी नवी कल्पना राबविण्याचा विचार केला जात आहे.\n-पुढील स्पर्धेपासून संघांची संख्या 48 करणे\n-दक्षिण अमेरिकन संघटनांकडून पुढील वर्षापासून खरंच हे शक्‍य आहे का याची पडताळणी करण्याची सूचना\n-2026च्या यजमानपदाचा निर्णय. मोरोक्कोखेरीज अमेरिका, कॅनडा आणि मेक्‍सिको यांची एकत्रित निविदा\n-प्रशासक समितीने पाठविलेल्या नव्या मानांकन पद्धतीच्या प्रस्तावर चर्चा करून मान्यता देणे\nसिद्धूचे पाक लष्करप्रमुखांना अलिंगन\nनवी दिल्ली : पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला काँग्रेसचे नेते व भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांना खास आमंत्रण होते....\n'एक धागा शौर्य' का सैनिकांसाठी जुन्नरच्या विद्यार्थ्यांनीचा अभिनव उपक्रम\nजुन्नर - सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांसाठी जुन्नरच्या शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थिनींनी 'एक धागा शौर्य'का हा अभिनव...\nभाषणात मोठी ताकद आहे.. : बबन साळगांवकर\nसावंतवाडी : भाषणात मोठी ताकद आहे त्याच वक्तृत्वाचा फायदा घेऊन तब्बल 23 दिवसांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे पहिल्यांदा आमदार बनले आणि त्यांनी नंतर...\nपिंपळवंडीला मानव-बिबट सहजीवन जनजागृती\nजुन्नर - पिंपळवंडी ता.जुन्नर येथे मानव व बिबट संघर्ष व सहजीवन याविषयी मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती करण्यात आली. जुन्नर वन विभाग तसेच...\nचिंचवडमध्ये रविवारी रंगणार महिला प्रेरणा संमेलन\nवाल्हेकरवाडी - स्वयंसिद्धा प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड शहर) आणि प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि. 19 ऑगस्ट) चिंचवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-18T10:57:10Z", "digest": "sha1:Y67EXXGIT46HM357PCWPS4P64LHR63WK", "length": 15912, "nlines": 184, "source_domain": "pcbtoday.in", "title": "“...तोपर्यंत मोदींना महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही” - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे…\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची…\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Maharashtra “…तोपर्यंत मोदींना महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही”\n“…तोपर्यंत मोदींना महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही”\nलातूर, दि. २७ (पीसीबी) – मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर होईपर्यंत पंतप्रधान नरेंद मोदी यांना महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा आज अखिल भारतीय छावा संघटनेने दिला. आज लातूर इथे झालेल्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या नानासाहेब जावळे यांनी हा इशारा दिला.\nआमदार-खासदारांनी राजीनाम्याचे स्टंट करु नयेत, त्यांनी सभागृहात आरक्षणाचा मुद्दा मांडण्याची गरज आहे, असे जावळे म्हणाले. तसेच, आरक्षणाची एवढीच काळजी असेल तर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर उपोषण करावे, असेही ते म्हणाले.\nसरकार चर्चेला तयार आहे, ही संकल्पनाच आम्हाला मान्य नाही, चर्चा वैगरे काही नको, आगोदर आरक्षणाचा निर्णय घ्या आणि नंतर चर्चा करा, अशी भूमिका छावाने घेतली आहे. याशिवाय शरद पवारांनी आरक्षणाबाबत ठोस भूमिका घ्यावी, वेळोवेळी भूमिका बदलू नये, असे नानासाहेब जावळे म्हणाले.\nगेल्या काही दिवासांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक झाला आहे. आधी ‘मूक मोर्चे’ काढणाऱ्या मराठा समाजाने आता ‘ठोक मोर्चे’ काढण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र बंद, मुंबई बंदही करण्यात आले. या सर्व आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी तोडफोड, जाळपोळ अशी तीव्र आंदोलनंही झाली. त्यामुळे एकंदरीतच मराठा समाजाने आरक्षणाची मागणी जोराने लावून धरली आहे.\nPrevious articleअँटिग्वाच्या नागरिकत्वासाठी २८ भारतीयांचे अर्ज\nNext article“…तोपर्यंत मोदींना महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही”\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घाेषणा\nहिम्मत होती तर एकेकाने यायचे होते मग दाखवले असते; औरंगाबादेतील एमआयएम नगरसेवकाचा माज\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nरूपयाची सत्तरी पार; अखेर मोदी सरकारने करून दाखवले – काँग्रेस\nराहुल गांधी देशभरातील १५०० प्राध्यापकांशी संवाद साधणार\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nनोटा जपून ठेवा, आम्ही त्या परत बदलून देऊ – प्रकाश आंबेडकर\nवाजपेयी जेव्हा विठ्ठलदर्शनासाठी पंढरपूरात आले होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.biblegateway.com/passage/?search=1%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87+2&version=ERV-MR", "date_download": "2018-08-18T10:16:35Z", "digest": "sha1:W67BXI5J6LNJFE3IZI2QUYUSV37MXYM4", "length": 42906, "nlines": 239, "source_domain": "www.biblegateway.com", "title": "1 राजे 2 ERV-MR - दावीद राजाचा - Bible Gateway", "raw_content": "\n1 राजे 11 राजे 3\n2 दावीद राजाचा मरणकाळ जवळ येऊन ठेपला होता. तेव्हा त्याने शलमोनाला जवळ बोलवून सांगितले, 2 “आता मी जाणार. मरण सगळ्यांनाच अटळ आहे. तूही आता चांगला खंबीर, जबाबदार पुरुष झाला आहेस. 3 आता परमेश्वर देवाच्या सर्व आज्ञांचे काळजीपूर्वक पालन कर. मोशेच्या नियमशास्त्रात लिहिलेल्या परमेश्वराच्या सर्व आज्ञा, नियम व निर्णय काटेकोरपणे पाळ. त्यामुळे तू जिथे जाशील तिथे, व जे कार्य हातात घेशील त्यात यशस्वी होशील. 4 तू परमेश्वराचे म्हणणे ऐकल्याने तो ही मला दिलेली वचने पाळील. परमेश्वराने मला सांगितले आहे ‘जर मी सांगितलेल्या मार्गाने मनापासून आणि प्रामाणिकपणाने तुझी मुले चालली तर इस्राएलचा राजा हा नेहमी तुझ्याच वंशातला असेल.’”\n5 दावीद पुढे म्हणाला, “सरुवेचा मुलगा यवाब याने काय केले ते लक्षात आहे ना त्याने इस्राएल सैन्याच्या दोन सेनापतींना, नेराचा मुलगा अबनेर आणि येथेरचा मुलगा अमासा यांना ठार केले आणि मुख्य म्हणजे हे शांततेच्या काळात केले. त्याचा तलवार खोचायचा कमरबंद आणि पायातले सैनिकी जोडे यांवर त्यांचे रक्त शिंपडले आहे. त्याला मीच शासन करायला हवे होते. 6 पण आता तू राजा आहेस. तेव्हा तुला योग्य वाटेल तसा तू त्यांना धडा शिकवू शकतोस. तो मारला जाईल याची तू खात्री करुन घे. त्याला शांततेने म्हातारपणी मरण येता कामा नये.\n7 “गिलादच्या बर्जिल्ल्य याच्या मुलांवर लोभ असू दे. त्यांच्याशी सख्य ठेव आणि तुझ्या पंगतीला त्यांना बसू दे. तुझा भाऊ अबशलोम याच्यापासून मी पळ काढला तेव्हा त्यांनीच मला मदत केली.\n8 “गेराचा मुलगा शिमी झकडे आसपासच आहे हे लक्षात ठेव. तो बहूरीम मधल्या बन्यामीन वंशातला आहे. मी महनाइमासला पळ काढला तेव्हा त्याने माझ्याविषयी फार वाईट उद्गार काढले. पुढे तो मला यार्देन नदीजवळ भेटायला आला. त्याला मी परमेश्वरासमक्ष वचन दिले की मी त्याला ठार करणार नाही. 9 पण आता त्याला तसा सोडू नकोस. तू सुज्ञ आहेस. काय करायचे ते तुला समजते. त्याला म्हातारपणी शांततेने मरु देऊ नकोस.”\n10 मग दावीद मरण पावला. दावीद नगरात त्याचे दफन झाले. 11 हेब्रोनवर सात वर्ष आणि यरुशलेम येथे तेहतीस वर्ष असे एकंदर चाळीस वर्षे त्याने इस्राएलवर राज्य केले.\nशलमोन राज्यावर ताबा मिळवितो\n12 आता शलमोन राजा होता. तो आपल्या वडीलांच्या दावीदाच्या सिंहासनावर बसला. त्याच्या राजेपणाविषयी आता कोणताही किंतु नव्हता.\n13 यानंतर हग्गीथेचा मुलगा अदोनीया शलमोनाची आई बथशेबा हिच्याकडे गेला. बथशेबाने त्याला विचारले, “तू सद्हेतूने आला आहेस ना\nअदोनीया म्हणाला, “हो, ही शांतता भेट आहे. 14 मला तुमच्याशी काही बोलायचे आहे.”\nबथशेबा म्हणाली, “मग बोल.”\n15 अदोनीया म्हणाला, “एक काळ असा होता की हे राज्य माझे होते. तुम्हाला हे माहीत आहे. मी राजा आहे अशीच इस्राएलच्या सर्व लोकांची भावना होती. पण पुढे सगळे बदलले. आता माझा भाऊ गादीवर आहे. परमेश्वरानेच त्याची निवड केली आहे. 16 आता माझे एक मागणे आहे. कृपा करुन नाही म्हणू नकोस.”\nबथशेबाने “तुला काय हवे\n17 अदोनीया म्हणाला, “राजा शलमोन तुला नाही म्हणणार नाही, तू सांगशील ते काहीही करील तेव्हा शुनेममधल्या त्या अबीशग नावाच्या तरुणीशी मला लग्र करायची संमती हवी आहे.”\n18 बथशेबा म्हणाली, “ठीक आहे, मी राजाशी बोलते.”\n19 मग बथशेबा राजा शलमोनाकडे गेली. तिला पाहिल्यावर तो उठून उभा राहिला. मग तिला वंदन करुन तो सिंहासनावर बसला. सेवकांना सांगून त्याने आईसाठी दुसरे सिंहासन आणवले. ती त्याच्या उजव्या हाताला बसली.\n20 बथशेबा त्याला म्हणाली, “मला एक छोटीशी गोष्ट तुझ्याजवळ मागायची आहे. कृपाकरुन नाही म्हणू नकोस.”\nराजा म्हणाला, “आई, तुला काय हवे ते माग मी नकार देणार नाही.”\n21 तेव्हा बथशेबा म्हणाली, “तुझा भाऊ अदोनीया याला शुनेमच्या अबीशगेशी लग्न करु दे.”\n22 राजा शलमोन आपल्या आईला म्हणाला, “अदोनीयासाठी अबीशगेचीच मागणी कशाला करतेस त्याच्यासाठी हे राज्यच का मागत नाहीस त्याच्यासाठी हे राज्यच का मागत नाहीस बोलून चालून तो माझा मोठा भाऊ आहे. याजक अब्याथार आणि यवाब त्याला पाठिंबा देतीलच.”\n23 मग परमेश्वराची शपथ घेऊन शलमोन म्हणाला, “अदोनीयाला मी याची अद्दल घडवीन. त्याला आता प्राणाला मुकावे लागेल. 24 इस्राएलचा राजा म्हणून परमेश्वराने माझी निवड केली आहे. माझ्या वडीलांच्या गादीवर त्याने मला बसवले आहे. आपण दिलेला शब्द पाळून राज्याची सत्ता परमेश्वराने आमच्या घराण्यात ठेवली आहे. तेव्हा आता त्याची शपथ घेऊन सांगतो की अदोनीयाला आज मृत्युदंड होईल.”\n25 राजा शलमोनाने मग बनायाला आज्ञा दिली आणि बनायाने बाहेर जाऊन अदोनीयाला ठार केले.\n26 मग राजा शलमोन अब्याथार याजकाला म्हणाला, “तुलाही मी मारायला हवे पण अनाथोथ येथल्या आपल्याघरी मी तुला जाऊ देतो. माझ्या वडीलांबरोबर मार्गक्रमण करताना परमेश्वराचा पवित्र करारकोश उचलून न्यायला तू मदत केलीस म्हणून तुला मी यावेळी जिवे मारत नाही. शिवाय त्यांच्या कठीण काळातही तू त्यांना साथ दिली आहेस” 27 परमेश्वराचा याजक म्हणून त्याला यापुढे काम करता येणार नाही असे शलमोनाने अब्याथार याजकाला सांगितले. असे होणार हे परमेश्वराने सांगितलेच होते. शिलो येथील याजक एली आणि त्याचे कुटुंब यांच्याविषयी देवाने असेच सांगितले होते. अब्याथार याजक एलीच्या कुटुंबातील होता.\n28 हे सर्व यवाबाच्या कानावर गेल्यावर तो भयभीत झाला. त्याने अबशालोमला पाठिंबा न देता अदोनीयाला पठिंबा दिला होता. म्हणून तो त्वरीत परमेश्वराच्या पवित्र मंडपात गेला आणि वेदीची शिंगे घटृ धरुन बसला. 29 कोणीतरी यवाब हा परमेश्वराच्या मंडपात वेदीपाशी आहे हे राजा शलमोनाला सांगितले. तेव्हा शलमोनाने बनायाला यवाबाला मारण्यासाठी पाठवले.\n30 बनाया परमेश्वराच्या पवित्र मंडपात जाऊन यवाबाला म्हणाला, “तेथून बाहेर पड ही राजाची आज्ञा आहे.”\nपण यवाबाने तेथेच मरण पत्करायला तयार असल्याचे सांगितले.\nतेव्हा बनायाने राजाकडे जाऊन त्याला हे सांगितले. 31 तेव्हा राजाने बनायाला हुकुम केला, “तो म्हणतो तसे कर त्याला तिथेच ठार कर. मग त्याचे दफन कर. म्हणजे मग आमच्या घराण्यावरचा यवाबाचा कलंक पुसला जाईल. यवाबाने निरपराधांची हत्या केली तो हा कलंक होय. 32 नेराचा मुलगा अबनेर आणि येथेरचा मुलगा अमासा या आपल्यापेक्षा चांगल्या अशा दोन माणसांना त्याने मारले होते. अबनेर इस्राएल सैन्याचा सेनापती तर अमासा यहूदा सैन्याचा सेनापती होता. माझे वडील दावीद यांना त्यावेळी या हत्येची कल्पना नव्हती. तेव्हा परमेश्वरच यवाबाला त्याच्या कृत्यांबद्दल शासन करत आहे. 33 त्यांच्या हत्येबद्दल यवाब अपराधी आहे. त्याच्या कुटुंबालाही हे ओझे कायमचे वागवावे लागेल. पण दावीद, त्यांचे वंशज, त्याच्या घराण्यातील राजे आणि त्याचे राज्य यांना देवाच्या कृपेने निरंतर शांतता लाभेल.”\n34 तेव्हा यहोयादाचा मुलगा बनाया याने यवाबाला ठार केले व वाळवंटातील त्याच्या घराजवळ त्याचे दफन करण्यात आले. 35 यवाबाच्या जागी मग शलमोनाने बनायाची सेनापती म्हणून नेमणूक केली आणि अब्याथारच्या जागी मुख्य याजक म्हणून सादोकची केली. 36 मग त्याने शिमीला बोलावणे पाठवले. त्याला सांगितले, “इथे यरुशलेममध्ये स्वतःसाठी घर बांधून राहा. हे नगर सोडू नको. 37 हे नगर सोडून किद्रोन झऱ्यापलीकडे गेलास तर त्या गुन्ह्याबद्दल तुला जीव गमवावा लागेल. तो तुझा अपराध असेल.”\n38 तेव्हा शिमी म्हणाला, “ठीक आहे, महाराज मी तुमच्या आज्ञेत आहे.” शिमी मग यरुशलेममध्येच बराच काळ राहिला. 39 पण तीन वर्षांनंतर शिमीचे दोन नोकर पळून गेले. गथचा राजा आणि माकाचा मुलगा आखीश याच्याकडे ते गेले. आपले चाकर गथ येथे असल्याचे शिमीला कळले. 40 तेव्हा त्याने आपल्या गाढवावर खोगीर चढवले आणि तो आखीश राजाकडे आपले नोकर शोधायला निघाला. तिथे ते मिळाल्यावर त्यांना त्याने परत घरी आणले.\n41 शिमी यरुशलेमहून गथला जाऊन आल्याचे कोणीतरी शलमोनाला सांगितले. 42 तेव्हा शलमोनाने त्याला बोलावून घेतले. शलमोन त्याला म्हणाला, “यरुशलेम सोडलेस तर तुझा वध होईल हे मी तुला देवाची शपथ घेऊन सांगितले होते. तू हे गाव सोडून इतरत्र गेलास तर तुझ्या मृत्यूला तूच जबाबदार राहशील असे मी तुला बजावले होते. आणि तू त्याला कबूल झाला होतास. माझा शब्द पाळायचे तू मान्य केले होतेस. 43 मग तू आज्ञाभंग का केलास तू वचन का मोडलेस तू वचन का मोडलेस 44 माझे वडील दावीद यांचे तू बरेच अपराध केले आहेस त्याबद्दल आता परमेश्वरच तुला शासन करील. 45 पण मला परमेश्वराचे आशीर्वाद राहतील. दावीदाचे राज्य तो सदासर्वकाळ सुरक्षित ठेवील.”\n46 मग राजाने बनायाला शिमीचा वध करायची आज्ञा दिली आणि बनायाने ती अंमलात आणली. आता शलमोनाची आपल्या राज्यावर पूर्ण पकड बसली.\n1 राजे 11 राजे 3\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/expensive-mark-taylor+shirts-price-list.html", "date_download": "2018-08-18T10:23:06Z", "digest": "sha1:LJUFOVSVGKYL3AQETI6M746A7P6A4GJC", "length": 25546, "nlines": 790, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग मार्क टेलर शिर्ट्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive मार्क टेलर शिर्ट्स Indiaकिंमत\nIndia 2018 Expensive मार्क टेलर शिर्ट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 949 पर्यंत ह्या 18 Aug 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग शिर्ट्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग मार्क टेलर शर्ट India मध्ये मार्क टेलर में s सॉलिड फॉर्मल शर्ट SKUPDd2mBO Rs. 576 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी मार्क टेलर शिर्ट्स < / strong>\n111 मार्क टेलर शिर्ट्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 569. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 949 येथे आपल्याला मार्क टेलर में s चेकेरेड फॉर्मल शर्ट SKUPDbn6Gn उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 488 उत्पादने\nउ स पोलो अससोसिएशन\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nकूक न कीच डिस्नी\nरस र 500 अँड बेलॉव\nशीर्ष 10मार्क टेलर शिर्ट्स\nमार्क टेलर में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nमार्क टेलर में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nमार्क टेलर में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nमार्क टेलर में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nमार्क टेलर में s चेकेरेड सासूल शर्ट\nमार्क टेलर में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nमार्क टेलर में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nमार्क टेलर में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nमार्क टेलर में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nमार्क टेलर में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nमार्क टेलर में s चेकेरेड सासूल शर्ट\nमार्क टेलर में s चेकेरेड सासूल शर्ट\nमार्क टेलर में s प्रिंटेड फॉर्मल शर्ट\nमार्क टेलर में s सॉलिड पार्टी शर्ट\nमार्क टेलर में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nमार्क टेलर में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nमार्क टेलर में स स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nमार्क टेलर में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nमार्क टेलर में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nमार्क टेलर में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nमार्क टेलर में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nमार्क टेलर में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nमार्क टेलर में s चेकेरेड पार्टी शर्ट\nमार्क टेलर में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2010/04/", "date_download": "2018-08-18T10:53:13Z", "digest": "sha1:6NZP5Y3SCX4JEJG2YPUMJBELBG6RRPZ2", "length": 10534, "nlines": 189, "source_domain": "kayvatelte.com", "title": "April | 2010 | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nमुंबईला सध्या पाण्याची कमतरता आहे. दररोज कुठे ना कुठे तरी पाइप लाइन डॅमेज झाल्यामुळे कित्येक लाख लिटर पाणी वाया जाते. असंही म्हंटलं जातं की ह्या पाइप लाइन डॅमेज करण्याचे काम टॅंकर लॉबीचे लोक करतात. परवाच कुठे तरी एक बातमी वाचली … Continue reading →\nउध्दवने रक्तदानाचा महायज्ञ केला आणि गिनिज बुकात नांव नोंदवलं शिवसेनेने प्रायोजित केलेल्या इव्हेंटचं. बरेच दिवसांच्या नंतर एक व्यवस्थित राबवलेली शिवसेनेची इव्हेंट म्हणता येईल ही.आता पुढे एक मे च्या दिवशी लता बाई गाणं पण गाणार आहेत – दहा हजार लोकांसमवेत, … Continue reading →\nमुंबईकर तीन गोष्टींच्या बाबतीत फारच सेन्सिटिव्ह आहे. पहिली गोष्ट म्हणजे म्हणजे अर्थातच क्रिकेट- आता त्यात नवीन काय- आता त्यात नवीन काय ते तर सगळ्यांना माहिती आहे असं म्हणता ते तर सगळ्यांना माहिती आहे असं म्हणता खरंय ते. पुलंनी पण यावर बरंच लिहून ठेवलंय- मुंबईकरांच्या दृष्टीने क्रिकेट हा खेळण्याचा नाही , तर … Continue reading →\nतुमचा लेख चोरून दुसऱ्या ब्लॉग वर प्रसिध्द झालाय\nकधी तरी तुमच्या एखाद्या मित्राचा मेल येतो, की तुझा लेख कुठल्यातरी दुसऱ्या एका ब्लॉग वर लिहिलेला आढळला. आता तुम्ही काय कराल ज्याने तो लेख चोरी केलाय त्याला आधी एक कॉमेंट टाकायचा प्रयत्न कराल- पण ज्याने तो लेख चोरी केलाय त्याला आधी एक कॉमेंट टाकायचा प्रयत्न कराल- पण एखाद्या ब्लॉग वर कॉमेंट डिसेबल … Continue reading →\nPosted in कम्प्युटर रिलेटेड\t| Tagged कॉपी राईट इशू.., चोरी, ब्लॉग, ब्लॉगेटिकेट्स, Blogger, Copy right issues\t| 38 Comments\nतुमचं वय साधारण २५ ते ३५ कितीही असेल. कधी रस्त्यावरून तुम्ही बाइक वर एखाद्या सिग्नलला उभे आहात , एक सुंदर -हो, कारण मुलगी नेहेमीच सुंदर असते हो. जगातली प्रत्येक मुलगी ही किमान एकदा तरी वळून पहाण्यासारखी असतेच, मुलींकडे न पहाणं … Continue reading →\nPosted in अनुभव\t| Tagged aging, अनुभव, ओल्ड एज, केस, पांढरे केस, म्हातारपण, वय, वाढणारं वय, old age\t| 55 Comments\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nसिक्रेट मेसेज कसा पाठवायचा\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-18T10:53:32Z", "digest": "sha1:PZHYUFKUB2V4D47DAPY7O4THAACDDG7Q", "length": 8671, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सीरियावरील कारवाईबाबत ब्रिटन आणि फ्रांसशी चर्चा करून निर्णय घेणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसीरियावरील कारवाईबाबत ब्रिटन आणि फ्रांसशी चर्चा करून निर्णय घेणार\nअमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचे प्रतिपादन\nवॉशिंग्टन – सीरियातील सत्ताधाऱ्यांनी आपल्याच देशातील आंदोलकांवर रासायनिक अस्त्रांचा जो वापर केला आहे त्याबाबत सीरियावर लष्करी कारवाई करण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी या आधीच दिला आहे. पण ही कारवाई कधी करायची यावर आपण ब्रिटन आणि फ्रांसशी चर्चा करून निर्णय घेऊ असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.\nव्हाईट हाऊस मध्ये सध्या सीरियावर कारवाई करण्याबाबत बैठकांची सत्र सुरू आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्‍त्या सारा सॅंडर्स यांनी सांगितले की अध्यक्ष ट्रम्प यांनी नुकतीच आपल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पथकाशी चर्चा केली. त्यात हल्ल्याबाबतचा अंतिम निर्णय अजून घेण्यात आलेला नाही.\nआज दिवसभरात अध्यक्ष ट्रम्प हे ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे आणि फ्रांसचे अध्यक्ष इमॅन्युएल मारकॉन यांच्याशी चर्चा करतील आणि हल्ल्याबाबत निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले. या कारवाई बाबत अध्यक्ष ट्रम्प हे सध्या आपल्या मित्र राष्ट्रांशी सातत्याने चर्चा करीत आहेत असे त्यांनी सांगितले. स्वत: ट्रम्प यांनी सकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले की मी या स्थितीवर अगदी सातत्याने लक्ष ठेऊन आहे.\nआम्ही निर्णयाच्या अगदी जवळ आलो आहोत आता पाहुया काय होते ते असे त्यांनी बैठकीला जाण्यापुर्वी पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले की आम्ही इसिसच्या बाबतीत अत्यंत चांगली कामगीरी केली आहे. त्यांना आम्ही नेस्तानबुत केले आहे आता आम्हाला आणखी मोठे काम करायचे आहे असेही ट्रम्प पत्रकारांशी बोलताना म्हणाले. दरम्यान ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी सीरियावरील लष्करी कारवाईला हिरवा कंदील दाखवला आहे असे वृत्त लंडनहून आले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबोको हरामकडून हजारावर मुलांचे अपहरण\nचीन करु शकतो अमेरिकी तळांवर हवाई हल्ला\nअमेरिकन लष्कराची परेड स्थगित – संरक्षण मंत्र्यांची मंजुरी नाही\nभारत – अमेरिका मैत्री संबंधांचे महत्व वाजपेयींनी खूप आधी ओळखले – अमेरिका\nडॉलरच्या तुलनेत रुपया आणखी घसरला\nअमेरिकेत 100 पेक्षा अधिक बेकायदा रहिवाश्‍यांना अटक\nब्रिटन संसदेबाहेर हल्ल्याचा प्रयत्न; 3 जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/agro-news-tomato-border-ban-121364", "date_download": "2018-08-18T10:57:26Z", "digest": "sha1:VIBX3ZS74BXUA7XSDQQ6XKJ25R3CW6HO", "length": 20422, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "agro news tomato border ban सीमाबंदीमुळे टोमॅटोचा लाल चिखल | eSakal", "raw_content": "\nसीमाबंदीमुळे टोमॅटोचा लाल चिखल\nसोमवार, 4 जून 2018\nकेंद्रीय कृषी मंत्रालयाने ३० मे रोजी फलोत्पादनविषयक दुसरे अनुमान जाहीर केले. त्यानुसार देशात २०१७-१८ मध्ये टोमॅटोचे उत्पादन २२० लाख टन होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन १३ लाख टनांनी वाढले आहे. तर २००७-०८ ते २०१७-१८ या दहा वर्षांच्या कालावधीत टोमॅटो उत्पादनात दुप्पट वाढ झाली आहे.\nकेंद्रीय कृषी मंत्रालयाने ३० मे रोजी फलोत्पादनविषयक दुसरे अनुमान जाहीर केले. त्यानुसार देशात २०१७-१८ मध्ये टोमॅटोचे उत्पादन २२० लाख टन होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन १३ लाख टनांनी वाढले आहे. तर २००७-०८ ते २०१७-१८ या दहा वर्षांच्या कालावधीत टोमॅटो उत्पादनात दुप्पट वाढ झाली आहे.\nजून ते डिसेंबर २०१७ या सहा महिन्यांत टोमॅटोचा सरासरी फार्मगेट विक्री दर किफायती होता. त्यामुळे जानेवारी २०१८ पासून टोमॅटो उत्पादनात वाढ होत गेली आणि टप्प्याटप्प्याने बाजार उत्पादन खर्चाच्या खाली घसरत गेला. चालू कॅलेंडर वर्षांतील पहिले पाच महिने मंदीत गेले आहेत. उत्तर भारतात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर फेकावे लागले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मागील पाच महिन्यांत नफा मिळालेला नाही. मेच्या शेवटच्या आठवड्यात बाजार थोडा सुधारला. सुरत मार्केटला चांगल्या मालाचा दर १५ रु. प्रतिकिलोपर्यंत वधारला. सटाणा भागातील काही शेतकऱ्यांच्या मालाला २० रु. दर मिळाला. मागच्या वर्षीही जूननंतर बाजार सुधारला होता आणि तो कल सात महिने टिकला. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे नैसर्गिकरित्या टोमॅटोचे उत्पादन संतुलित होते आणि किफायती बाजार मिळतो, हे गृहीत धरून या वर्षी टोमॅटो लागवडीचा कल वाढला. रोपे विकणाऱ्या फर्मकडील माहितीनुसार रोपांसाठी मोठी वेटिंग लिस्ट होती. मराठवाड्यासारख्या अपारंपरिक विभागातूनही लक्षणीय प्रमाणात मागणी वाढली होती.\nज्या हंगामात नफा मिळतो, त्यानुसार उत्पादन मागे-पुढे करण्याचे व्यावसायिक आणि तांत्रिक कौशल्य महाराष्ट्र-कर्नाटकातील शेतकऱ्यांनी अवगत गेले आहे. शिवाय, नैसर्गिक आपत्ती वगळता देशभरात वर्षभर सातत्यपूर्ण पुरवठा या ना त्या भागातून सुरू असतो. गेल्या वर्षी जूननंतर नफा मिळाल्याने स्वाभाविकपणे या वर्षी पुरवठा जास्त राहणार आहे. एप्रिल-मे मधील उन्हाळ्यात किती टक्के नुकसान झाले, यापुढे पाऊसमानामुळे किती नुकसान होते, हे पुरेसे सुस्पष्ट नसले तरी पुरवठा नियंत्रित करण्यात हे घटक प्रभावी ठरतील. जून ते डिसेंबर २०१८ या कालावधीत जून ते डिसेंबर २०१७ इतका उच्चांकी दर मिळणार नाही, हे सध्याच्या उत्पादनवृद्धीच्या कलावरून दिसते.\nदेशातील निम्म्याहून अधिक टोमॅटो उत्पादन आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओरिसा, महाराष्ट्र, प. बंगाल, बिहार, गुजरात या राज्यांत होते. यातील महाराष्ट्र आणि गुजरात ही वर्षभर टोमॅटो पिकवणारी राज्ये आहेत. अन्य राज्यांत हंगामी उत्पादन होते. त्यामुळे उत्पादनवाढीची आणि पर्यायाने मंदीची झळ महाराष्ट्र व गुजरातला सर्वाधिक बसते. दीर्घकाळ मंदी टिकूनही उत्पादन का कमी होत नाही, याबाबतची निरीक्षणे अशीः १. गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पादन घेण्याचे कौशल्य वाढले आहे. २. उत्पादनाचे अन्य स्त्रोत उपलब्ध नसणे किंवा अन्य व्यापारी पिकांचे उत्पादन घेण्याचे कौशल्य नसणे. ३. दीर्घकालीन मंदीचा अंदाज येत नाही, तेजीच्या अपेक्षेने गुंतवणूक सुरू ठेवणे. ४. जास्तीत जास्त सात-आठ महिने पिकाची तोडणी सुरू राहते.\nस्ट्रक्चर बांधणी व पायाभूत सुविधावरील खर्च मध्येच तोडता न येणे. अर्थात, वरील निरीक्षणे ही महाराष्ट्रासाठी अधिक संयुक्तिक आहेत.\nटोमॅटोच्या बाजाराला आधार मिळायचा असेल, तर निर्यातवृद्धी झाली पाहिजे. चालू वर्षांतील निर्यातीचे चित्र फार निराशाजनक आहे. अपेडाकडील माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये पाकिस्तानला ३६८ कोटी रुपयांच्या टोमॅटोची निर्यात झाली होती; त्या तुलनेत २०१७-१८ मध्ये केवळ ३४ लाख रुपयांच्या टोमॅटोची निर्यात झाली. दुसरीकडे, बांगलादेशला होणारी निर्यात ६६.६ कोटीवरून ४.८ कोटीपर्यंत घटली आहे. वर्षभरापासून सीमा बंद असल्याने निर्यात रोडावल्याचे दिसते. भारताच्या एकूण टोमॅटो निर्यातीत पाकिस्तान व बांगलादेशचा वाटा ७५ टक्क्यांहून अधिक आहे.\nपुणे-नाशिक या दोन्ही जिल्ह्यांतील अर्थकारणात टोमॅटोचा मोठा वाटा आहे. चार लोकसभा मतदारसंघातील आणि किमान २० विधानसभा मतदारसंघातील अर्थव्यवस्थेतील टोमॅटो हे प्रमुख पीक आहे. सीमाबंदी उठवण्यासाठी टोमॅटो उत्पादकांनी आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला का, हा प्रश्न कळीचा आहे. टोमॅटो उत्पादकांचे प्रभाव संघटन नसणे आणि सीमाबंदी उठवण्याविषयी राजकीय आणि प्रशासकीय उदासिनता हे सध्याच्या मंदीचे प्रमुख कारण आहे. केवळ उत्पादनवृद्धीमुळे मंदी येत नाही, तर संभाव्य वाढता पुरवठा आणि त्याचे देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत योग्यप्रकारे समायोजन करणारी यंत्रणा अस्तित्वात नसणे याची मोठी किंमत आपण मोजतोय. सीमा बंद असल्यामुळे वर्षाकाठी पाचशे कोटींचे थेट नुकसान होतेच. पण, तो माल देशांतर्गत बाजारात साचल्यामुळे पुरवठावाढ होऊन हजारो कोटींनी उत्पन्न घटते.\nव्यक्तिगतरित्या तुम्ही कितीही चांगल्याप्रकारे टोमॅटो उत्पादन काढत असला तरी सामूहिक संघटन नसल्याने सर्व कष्ट निरर्थक ठरतात. टोमॅटो उत्पादकांचे संघटन व प्रभावी दबावगट हेच टोमॅटोच्या लाल चिखलावरचे उत्तर आहे.\n(लेखक शेतीमाल बाजार अभ्यासक आहेत.)\nMaratha Kranti Morcha : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री आंदोलन\nपुणे : मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे सोमवारपासून (ता.20) मराठा आरक्षणासाठी आणि विविध मागण्यांसाठी पुणे विभागीय आयुक्त...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nभाषणात मोठी ताकद आहे.. : बबन साळगांवकर\nसावंतवाडी : भाषणात मोठी ताकद आहे त्याच वक्तृत्वाचा फायदा घेऊन तब्बल 23 दिवसांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे पहिल्यांदा आमदार बनले आणि त्यांनी नंतर...\nबारामती - विद्या प्रतिष्ठानच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पुरस्कार\nबारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट...\nपंकज भूसे यांचा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव\nसरळगांव - महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी होऊन दिलेल्या उद्दिष्टा पेक्षा जास्त वृक्ष लागवड करून उत्कृष्ट कामगिरी केल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/river-cleaning-public-39620", "date_download": "2018-08-18T11:02:12Z", "digest": "sha1:BWSKD5ALP77LI5LVC5RFYXXR5V5K3NCJ", "length": 13925, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "river cleaning by public शहरातील नद्यांची स्वच्छता यंदाही लोकसहभागातून | eSakal", "raw_content": "\nशहरातील नद्यांची स्वच्छता यंदाही लोकसहभागातून\nबुधवार, 12 एप्रिल 2017\nनागपूर - लोकसहभाग आणि शहरातील नद्यांची स्वच्छता असे आता समीकरणच झाले आहे. सामाजिक संस्था, नागरिकांच्या सहकार्याने यंदाही नाग, पिवळी व पोरा नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. 17 एप्रिलपासून या अभियानाला प्रारंभ करण्यात येणार असून उद्या, 12 रोजी महापालिकेत या अभियानावर खल होणार आहे. महिनाभर ही मोहीम राबविण्यात येणार आहे.\nनागपूर - लोकसहभाग आणि शहरातील नद्यांची स्वच्छता असे आता समीकरणच झाले आहे. सामाजिक संस्था, नागरिकांच्या सहकार्याने यंदाही नाग, पिवळी व पोरा नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. 17 एप्रिलपासून या अभियानाला प्रारंभ करण्यात येणार असून उद्या, 12 रोजी महापालिकेत या अभियानावर खल होणार आहे. महिनाभर ही मोहीम राबविण्यात येणार आहे.\n2013 पासून तत्कालीन महापौर प्रा. अनिल सोले यांनी नागनदी स्वच्छ करण्यासाठी लोकसहभागातून अभियानाचा पाया रचला.\nनागनदीसोबतच पिवळी नदी तसेच पोरा नदी स्वच्छतेचीही मोहीम गेल्या काही वर्षांत सुरू करण्यात आली. आता शहरातील तिन्ही नद्यांच्या स्वच्छतेसाठी अभियान राबविले जात आहे. यंदा 17 एप्रिलपासून नदी स्वच्छता अभियानाला प्रारंभ करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांत प्रामुख्याने नागनदी स्वच्छतेवर भर देण्यात आला. यातूनच नागनदी सौंदर्यीकरणाचा तसेच नागनदीतील पाणी शुद्ध करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा आराखडा तयार झाला असून केंद्राने दोन्ही आराखड्यांना मंजुरी दिली आहे. 2500 कोटींचे हे दोन्ही विकास आराखडे असून लवकरच निधी मिळण्याची शक्‍यता आहे. यंदा नदी स्वच्छता अभियान पश्‍चिमेतून सुरू झालेल्या उत्तर नागपूरमार्गे पूर्व नागपुरात नागनदीला मिळालेल्या पिवळी नदीतून स्वच्छता अभियानाला प्रारंभ करण्यात येणार आहे. नदी स्वच्छतेनंतर काही दिवसांत नागरिक नदीत कचरा, माती पुन्हा टाकत असल्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे दरवर्षी स्वच्छता अभियान राबवून नद्या स्वच्छ करण्यात येतात. यंदाही सामाजिक संस्था, नागरिकांचे सहकार्य या मोहिमेसाठी घेण्यात येणार आहे. उद्या, 12 रोजी महापालिकेत यावर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.\nपावसाळ्यापूर्वी नदी स्वच्छतेमुळे गेल्या काही वर्षांत शहरात पावसाचे पाणी जमा होत नसून नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.\nमहापालिका निवडणुकीनंतर अनेक नवे नगरसेवक निवडून आले आहेत. 108 सदस्य निवडून आलेल्या भाजपमधील अनेक नव्या नगरसेवकांत या मोहिमेबाबत उत्सुकता आहे. यंदा नाग नदीसोबतच पिवळी नदीच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.\nसंयुक्त राष्ट्रांच्या माजी महासचिवांचे निधन\nसंयुक्त राष्ट्रसंघ- संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण महासभेचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन झाले आहे. 8 एप्रिल 1938 रोजी त्यांचा घाना या देशात...\nएमआयएम नगरसेवक मतीन यांना अटक\nऔरंगाबाद- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला नकार देणारे औरंगाबादमधील एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना आज अटक करण्यात...\nसंग्रामपूर : वाण धरण ६५ टक्के भरले\nसंग्रामपूर : सातपुडा पर्वतामधील तीन जिल्ह्यांसाठी जलसंजीवनी ठरलेले वाण धरण 65 टक्के भरले आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या ...\nपंकज भूसे यांचा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव\nसरळगांव - महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी होऊन दिलेल्या उद्दिष्टा पेक्षा जास्त वृक्ष लागवड करून उत्कृष्ट कामगिरी केल्याने...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.rmponweb.org/testimonial.aspx?id=5", "date_download": "2018-08-18T10:18:43Z", "digest": "sha1:6FTMJF6ZMDW5RQBX6EPQCVB3OZNP7PO5", "length": 7389, "nlines": 64, "source_domain": "www.rmponweb.org", "title": "Rambhau Mhalgi Prabodhini", "raw_content": "\nगुरुवार सभा, दि. ३० ऑगस्ट, २०१८ विषय: \"राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स (एन.आर.सी.) एक वास्तव\", वक्ते: माधव भांडारी , स्थान: १७ चंचल स्मृती, गं.द.आंबेकर मार्ग, वडाळा, मुंबई-३१, वेळ: सायं. ६.३० वाजता.\nशालेय ग्रंथपाल / साहाय्यक ग्रंथपाल क्षमता विकास कार्यशाळा दि. २०-२१ ऑक्टोबर, २०१८ स्थान : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, ज्ञान-नैपुण्य केंद्र, केशवसृष्टी, उत्तन, भाईंदर (प.\nराजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींसाठी, पुणे येथे नेतृत्व विकास कार्यशाळा (८-९ सप्टेंबर, ६-७ ऑक्टोबर, १७-१८ नोव्हेंबर २०१८)\nआर्य चाणक्य निबंध स्पर्धा ही सर्वसामान्य निबंध स्पर्धांपेक्षा नक्कीच वेगळी आणि विशेष होती कारण स्पर्धेचे विषय व्यापक होते व त्यासाठी अभ्यास करून, विषय समजून घेऊन लिखाण करणे भाग होते. स्पर्धेचे नियम हे स्पर्धेची गुणवत्ता वाढवणारे होते. शब्दसंख्येची मर्यादा ही विषयांना पूर्ण न्याय देता येईल अशीच होती. तीनही विषय एकमेकांना सुसंगत तरीही स्वयंपूर्ण होते. स्पर्धेच्या निमित्ताने आर्य चाणक्य यांचे साहित्य वाचायची व त्यांचे विचार समजून घ्यायची संधी मिळाली. स्पर्धेमुळे प्रथमच चाणक्यांच्या अर्थनीतीचा आणि राष्ट्रनीतीचा मी अभ्यास केला. आजपर्यंत मला चाणक्य केवळ गोष्टींपुरते आणि चाणक्यनीती पुरतेच माहीत होते. स्पर्धेनिमित्त चाणक्यांच्या आयुष्याचा अभ्यास करण्याचा योग आला. आयुष्यामध्ये राष्ट्रासाठी मोठी भव्य कृती करायची असेल तर त्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न केले पाहिजे असे चाणक्य आणि चंद्रगुप्त यांच्या जीवनाचा अभ्यास करताना प्रकर्षाने जाणवले हा अभ्यास आणि अनुभव नक्कीच एक स्पर्धक आणि एक व्यक्ती म्हणूनही समृद्ध करणारा होता. स्पर्धेचे निबंध पाठवण्याची आणि संपर्काची व्यवस्था अतिशय सोपी आणि सुलभ होती. प्रबोधिनीचे सर्व कार्यकर्ते मदतीस अतिशय तत्पर आणि प्रेमळ असल्याचा सुखद अनुभव आला. स्वतःचे अनुभवविश्व खर्‍या अर्थाने विस्तारणारी आणि समृद्ध करणारी अशी ही स्पर्धा होती. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळाले याचा विशेष आनंद झाला. बक्षीस समारंभ अतिशय भव्य असा होता. आयुष्यामधील नक्कीच संस्मरणीय अशा क्षणांपैकी एक होता. समारंभाचा कार्यक्रम नक्कीच देशपातळीवरील निबंध स्पर्धेला साजेसा होता. अमितजी शहा यांच्या हस्ते बक्षिस स्वीकारणे नक्कीच आनंददायी आणि उत्साहवर्धक होते हा अभ्यास आणि अनुभव नक्कीच एक स्पर्धक आणि एक व्यक्ती म्हणूनही समृद्ध करणारा होता. स्पर्धेचे निबंध पाठवण्याची आणि संपर्काची व्यवस्था अतिशय सोपी आणि सुलभ होती. प्रबोधिनीचे सर्व कार्यकर्ते मदतीस अतिशय तत्पर आणि प्रेमळ असल्याचा सुखद अनुभव आला. स्वतःचे अनुभवविश्व खर्‍या अर्थाने विस्तारणारी आणि समृद्ध करणारी अशी ही स्पर्धा होती. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळाले याचा विशेष आनंद झाला. बक्षीस समारंभ अतिशय भव्य असा होता. आयुष्यामधील नक्कीच संस्मरणीय अशा क्षणांपैकी एक होता. समारंभाचा कार्यक्रम नक्कीच देशपातळीवरील निबंध स्पर्धेला साजेसा होता. अमितजी शहा यांच्या हस्ते बक्षिस स्वीकारणे नक्कीच आनंददायी आणि उत्साहवर्धक होते पुढे स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी नक्कीच ते प्रेरक ठरेल. प्रबोधिनीच्या व्याख्यानमालेतील १२वे व्याख्यान त्यानिमित्ताने ऐकायला मिळाले. अतिशय अभ्यासपूर्ण असे व्याख्यान होते. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अश्या वैचारिक कार्यक्रमांस आणि स्पर्धेतही आवर्जून यापुढेही उपस्थित राहायला आणि भाग घ्यायला नक्की आवडेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.tarunbharat.com/news/600173", "date_download": "2018-08-18T10:26:16Z", "digest": "sha1:E5VV6UM5EUY7G5MBLDIFW6SFQWXPQKPW", "length": 7723, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चाकूचा धाक दाखवून वृद्धेला लुबाडले - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » चाकूचा धाक दाखवून वृद्धेला लुबाडले\nचाकूचा धाक दाखवून वृद्धेला लुबाडले\nलुबाडणूक झालेल्या सीता गवस.\nसासोली पाटये पुनर्वसन येथे गाडीची वाट पाहत उभ्या असणाऱया वृद्धेला लिफ्ट देऊन तिला निर्जनस्थळी नेत चाकूचा धाक दाखवून लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी घडला. सीता शांताराम गवस (70, रा. कसई-दोडामार्ग-धाटवाडी) असे लुबाडणूक झालेल्या वृद्धेचे नाव असून त्यांच्या गळय़ातील सोन्याची चेन चोरटय़ाने हिसकावून नेली. याबाबत दोडामार्ग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आठवडाभरात लुटीच्या सलग दोन घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.\nगाडीची वाट पाहत बसथांब्यावर एकटय़ा-दुकटय़ा उभ्या असणाऱया वयोवृद्ध महिलांना लुटण्यावर चोरटय़ांनी आता लक्ष्य केंद्रीत केले आहे. आठवडाभरापूर्वी कसई-केळीचेटेंब येथे बसची वाट पाहत असणाऱया वृद्धेला लिफ्ट देऊन निर्जनस्थळी नेत तिच्या गळय़ातील सोन्याची माळ हिसकावण्याचा प्रकार घडल्यानंतर पुन्हा बुधवारी तशीच घटना सासोली पाटय़े पुनर्वसन येथे बसथांब्यावर उभ्या असलेल्या वृद्धेबाबतीत घडला.\nकसई-दोडामार्ग धाटवाडी येथील सीता शांताराम गवस यांच्या घराचे सासोली पाटय़े पुनर्वसन येथे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे त्या तेथे गेल्या होत्या. दुपारी पुन्हा दोडामार्गमध्ये येण्यासाठी त्या निघाल्या. सासोली पाटये पुनर्वसन येथील बसथांब्यावर त्या बसची वाट पाहत उभ्या होत्या. त्यावेळी तेथे एक मोटारसायकलस्वार आला. त्याने श्रीमती गवस यांना दोडामार्गमध्ये नेतो, असे सांगून लिफ्ट दिली. मात्र, त्यांना दोडामार्गमध्ये न नेता मणेरी येथे एका निर्जनस्थळी नेत जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या गळय़ातील सोन्याची चेन हिसकावून घेत तेथून पलायन केले. या प्रकारामुळे श्रीमती गवस यांना धक्का बसला. त्यांना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.\nदरम्यान, अनोळखी व्यक्तीच्या वाहनात किंवा मोटारसायकलवर न बसण्याचे आवाहन दोडामार्ग पोलिसांनी केले आहे. वयोवृद्ध महिलांना लुबाडण्यासाठी लक्ष्य करणाऱया चोरटय़ांना पकडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.\nमुणगे भगवती देवस्थानचा 11 पासून वार्षिकोत्सव\nमालवण आगाराला आठ लाखाचे उत्पन्न\nडोंगरपालच्या शेतकऱयाचा तापाने उपचारादरम्यान मृत्यू\nसर्पदंशाने वृद्धेच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ आक्रमक\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%9F.html", "date_download": "2018-08-18T11:05:28Z", "digest": "sha1:5AMYX6CRBFVQXMYON5AVSGB46BYKXVGV", "length": 21663, "nlines": 291, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | विधिमंडळ कामकाजाच्या थेट प्रक्षेपणास सुरुवात", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, महाराष्ट्र » विधिमंडळ कामकाजाच्या थेट प्रक्षेपणास सुरुवात\nविधिमंडळ कामकाजाच्या थेट प्रक्षेपणास सुरुवात\nमुंबई, [१६ मार्च] – राज्यासाठी कायदे तयार करणार्‍या महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे कामकाज कसे चालते याची सर्वसामान्यांना असलेली उत्सुकता आता संपली आहे. संसदेप्रमाणे विधिमंडळाच्या विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहाच्या कामकाजाच्या दूरदर्शनवर थेट प्रक्षेपणाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे, अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहात दिली.\nअर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या आठवड्याच्या कामकाजाला सोमवारपासून सुरुवात झाली. प्रश्‍नोत्तराचा तास सुरू होण्यापूर्वीच संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारपासून सभागृहातील प्रश्‍नोत्तराच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण दाखविले जाणार असून, अध्यक्षांनी त्याची सभागृहाला माहिती द्यावी, असे सांगितले.\nनागपूर येथील अधिवेशनात या कामकाजाच्या प्रक्षेपणाचा प्रयोग केला होता, अशी आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. सभागृहाच्या कामकाजाचे प्रक्षेपण होणार ही ऐतिहासिक बाब आहे. सदस्यांनी सभागृहाचे पावित्र्य राखणे ही सभासदांची जबाबदारी आहे. त्यादृष्टीने सभासदांनी चांगली भाषणे करून जनतेच्या समस्या मांडाव्या, असे आवाहन अध्यक्ष बागडे यांनी केले.\n५ हजार कोटींच्या कामांचे ई-भूमिपूजन\nनितीन गडकरींच्या निर्णयाने महाराष्ट्रातील सिंचन क्षमता वाढणार\nसुनील तटकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nसरकारी लाभांसाठी ‘आधार’ अनिवार्य नाही\n=सुप्रीम कोर्टाचा पुनरुच्चार= नवी दिल्ली, [१६ मार्च] - केवळ आधार कार्ड नाही म्हणून देशातील कोणतीही व्यक्ती सरकारी योजनांच्या आर्थिक लाभापासून ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vastu-lekh-news/property-document-verification-on-one-sms-1622053/", "date_download": "2018-08-18T11:14:34Z", "digest": "sha1:MOKMTKQODGBHBGXJSLS5OW47SBDFX5TV", "length": 18585, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Property Document verification on one SMS | दस्तऐवज पडताळणी फक्त एका एस.एम.एस.वर | Loksatta", "raw_content": "\nबेशिस्त वाहनचालकांना ९१ लाखांचा दंड\nपक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा\nपुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित\nजळगावमध्ये महाजन-खडसे गटबाजीची सर्वत्र बाधा\nएमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल\nदस्तऐवज पडताळणी फक्त एका एस.एम.एस.वर\nदस्तऐवज पडताळणी फक्त एका एस.एम.एस.वर\nजमीन, सदनिका आदी खरेदी-विक्री व्यवहारांची खोटी कागदपत्रे नोटरी करून प्रमाणित केली जातात.\nमालमत्ता खरेदी मग ती स्थावर स्वरूपाची असो किंवा सदनिका, दुकान वा अन्य कोणत्याही स्वरूपाची असो, सर्वसामान्य माणसाला ती आयुष्यात एकदाच खरेदी करण्याची वेळ येते. अशा व्यवहारात मालमत्तेची ‘क्लीयर टायटल’ निर्वेध असणे अत्यंत आवश्यक आहे. या दृष्टीने मालमत्तेचा मालकी हक्क त्याच्या विद्यमान मालकाला विक्री करण्याचा आणि भविष्यात व्यवहार करण्याचा अधिकार प्राप्त होतो. एखाद्या मालमत्तेचा किंवा घराचा स्वच्छ आणि विक्रीयोग्य अधिकार हा आपले घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रक्रियेतील\nसर्वात महत्त्वाचा घटक आहे. घर खरेदीत आर्थिक आणि भावनिक गुंतवणूक असल्यामुळे आपण योग्य ती मालमत्ता योग्य त्या प्रक्रियेद्वारे विकत घेणे आणि त्यातील कायदेशीर बाबींचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे.\nजमीन, सदनिका आदी खरेदी-विक्री व्यवहारांची खोटी कागदपत्रे नोटरी करून प्रमाणित केली जातात. त्यामुळे हा व्यवहार अधिकृत आहे असे सर्वसामान्य नागरिकांकडून समजले जाते. आपण इमारत, चाळीमध्ये घेतलेले घर, खरेदी केलेली जमीन दोनशे-पाचशे रुपयांच्या मुद्रांक पेपरवरील मजकुरावरून खरेदी केली आहे. हा व्यवहार बनावट आहे याची जाणीव जेव्हा खरेदीदाराला होते, तोपर्यंत विक्री व्यवहार करणारा विकासक किंवा दलाल फरार झालेले असतात. मग न्याय मिळविण्यासाठी फसवणूक झालेली मंडळी न्यायालयात जातात. पोलीस अशा प्रकरणांची गांभीर्याने दखल घेत नाहीत. त्यामुळे न्यायालयांमध्ये अलीकडे जमीन व्यवहारातून फसवणूक झालेल्या व्यवहारांची अनेक प्रकरणे दाखल होत आहेत. जमीन एकाची, त्यावर बांधकाम करणारा वेगळा, त्यामधील सदनिका विकणारा तिसरा आणि खरेदी-विक्री करणारा चौथाच अशा प्रकारची एक साखळी या जमीन व्यवहारात सक्रिय झाली आहे. यात आणखीन एक प्रकार असा की, आपण खरेदी केलेली जमीन व सदनिका आणखी काही जणांना बनावट कागदपत्रांद्वारे विक्री केलेली असते. तसेच सदरहू जागेबाबतचा व्यवहार न्यायप्रविष्ट असल्याचे मागाहून समजते. जागेबाबतचा व्यवहार योग्य ते मुद्रांक शुल्क भरून उपनिबंधक कार्यालयात रीतसर नोंदणी होणे आवश्यक आहे. अशा सर्व नोंदणीकृत कराराची माहिती उपनिबंधक कार्यालयात कायमस्वरूपी जतन करण्यात येते. राज्यातील कोणत्याही जिल्ह्य़ातील जमीन-जुमला व सदनिकेबाबत आतापर्यंत रीतसर नोंदणी करण्यात आलेल्या सर्व वैध करारांची माहिती सहज उपलब्ध होते. त्यावरून आपण खरेदी करण्यासाठी उत्सुक असलेल्या जमिनीसंदर्भात अथवा सदनिकेबाबतच्या नोंदणीकृत करारांची माहिती एका लघु-संदेशाद्वारे (एस.एम.एस) सहज उपलब्ध होऊ शकते, त्याबाबत अधिक माहिती घेऊ :\nराज्यातील नागरिकांना कोणत्याही जिल्ह्य़ातील उपनिबंधक कार्यालयात कोणताही दस्तऐवज रीतसर नोंदणी झालेला आहे किंवा नाही याची सत्यता पडताळणी करणे फक्त एका लघुसंदेश ( एस.एम.एस.) द्वारे शक्य होणार आहे.\nहे नेमके काय आहे :\n(१) लघुसंदेश (एस.एम.एस.) द्वारे दस्तऐवज नोंदणी पडताळणी करण्याची सुविधा.\n(२) आपल्यासमोर सादर करण्यात आलेला दस्तऐवज हा नोंदणीकृत आहे व तो खरा आहे किंवा नाही हे कोणालाही पडताळणी करता येईल.\n(३) यासाठी इंटरनेटची आवश्यकता नाही. फक्त लघुसंदेश (एस.एम.एस.) द्वारे हे शक्य होते.\n(अ) ‘ई- सर्च’ द्वारेसुद्धा नोंदणीकृत दस्तऐवज पडताळणी करू शकता. परंतु त्यासाठी इंटरनेट, कॉम्प्युटर/ लॅपटॉप/ स्मार्ट फोन आवश्यक आहे.\n(ब) प्राथमिक स्तरावर एस.एम.एस. द्वारे पडताळणी करणे सहज शक्य होते. त्यामुळे त्वरित पडताळणी व निर्णयप्रक्रिया सुलभ होते.\nराज्यातील कोणत्याही जिल्ह्य़ातील जमीन-जुमला व सदनिकेबाबत योग्य ते मुद्रांक शुल्क भरून उपनिबंधक कार्यालयात रीतसर नोंदणी झालेल्या व खाली नमूद केलेल्या कालावधीतील कोणत्याही दस्तऐवजाची सत्यता पडताळणी करावयाची आवश्यकता भासल्यास नागरिकांनी ९७६६८९९८९९ या क्रमांकावर एस.एम.एस. करा.\nएस.एम.एस. करण्यासाठी खालील गोष्टींची आवश्यकता आहे.\n(१) एस. आर. ओ. शॉर्ट कोड / डॉक्युमेंट नंबर / डॉक्युमेंट वर्ष.\nअ) एस. आर. ओ. शॉर्ट कोड = उपनिबंधक कार्यालयाचा संक्षिप्त कोड\nउदाहरणार्थ = ठाणे-१ – ळ ठ ठ-1\nब) डॉक्युमेंट नंबर व डॉक्युमेंट वर्ष संबंधित दस्तऐवजाच्या प्रत्येक पानावर उमटविलेला असतो.\n१९८५ ते २००१ — मॅन्युअल रजिस्ट्रेशन\n२००२ ते २०१२ — संगणकीकृत रजिस्ट्रेशन जुलै २०१२ नंतर —\n(१) जुलै २०१२ नंतर रीतसर नोंदणी करण्यात आलेले सर्व दस्तऐवज एस.एम.एस. द्वारे सत्यता पडताळणी करण्यास उपलब्ध आहेत.\n(२) एक महिन्याच्या आत २००२ ते २०१२ या कालावधीत रीतसर नोंदणी करण्यात आलेले सर्व दस्तऐवज एस.एम.एस. द्वारे सत्यता पडताळणीस उपलब्ध करण्यात येतील.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n पिंपरीत पित्याने दोन मुलांची हत्या करुन केली आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nIt's Official: नात्यावर शिक्कामोर्तब करत अखेर निक-प्रियांका म्हणाले....\nसहजीवनाचा पहिला टप्पा सर, थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा\nइम्रान खानच्या शपथविधीला सिद्धूंना मानाचे स्थान, घेतली लष्करप्रमुखांची गळाभेट\nमिनी एसयुव्हीसारखं डिझाईन असलेली नवीन रेनाँ क्विड वसूल करते तुमचा पै न पै\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nअंतर्गत वाहतुकीसाठी ट्रामचा पर्याय\nवाहनांना एक टोल माफ\nरेल्वेचे संगणकीय आरक्षण केंद्र पावणेतीन तास बंद राहणार\nस्वानंद देणारे शिक्षण निवडा\nवामनदादा कर्डकांना शाहिरीतून अभिवादन\nभूगावमधील हॉटेलमध्ये कोंबडय़ांच्या झुंजीवर जुगार\nपाणी पुरेना आणि म्हणे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/half+shirts-price-list.html", "date_download": "2018-08-18T10:10:06Z", "digest": "sha1:3ENCV67F6PYNC6ZWVGHQXZUMPNBT74TC", "length": 21150, "nlines": 594, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "हाल्फ शिर्ट्स किंमत India मध्ये 18 Aug 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2018 हाल्फ शिर्ट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nहाल्फ शिर्ट्स दर India मध्ये 18 August 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 3312 एकूण हाल्फ शिर्ट्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन एक्सकॅलिबर में s सॉलिड फॉर्मल शर्ट SKUPDcIICE आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Homeshop18, Flipkart, Naaptol, Shopclues सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी हाल्फ शिर्ट्स\nकिंमत हाल्फ शिर्ट्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन सुपर ड्राय में s सॉलिड सासूल शर्ट SKUPDc65xO Rs. 6,990 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.119 येथे आपल्याला पीओतले बॉय s चेकेरेड सासूल शर्ट SKUPDdeEZz उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 3312 उत्पादने\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nरस 2000 2001 अँड दाबावे\nरस र 500 अँड बेलॉव\nसेमी कट अवे कॉलर\nबृमॅक्स में s पलायन फॉर्मल शर्ट\nCool Quotient बॉय s सॉलिड सासूल शर्ट\nविशाल मेगा मार्ट बॉय s सॉलिड सासूल शर्ट\nजोशुआ ट्री बॉय s प्रिंटेड सासूल शर्ट\nसुकिमा शिर्ट्स बॉय s पोलका प्रिंट सासूल शर्ट\nलाल पोपपेट्स बॉय s फ्लोरल प्रिंट सासूल शर्ट\nओव्हरड्राइव्ह बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nजॅझझूप बॉय s सॉलिड सासूल पार्टी फेस्टिव्ह शर्ट\nजिम & जॅम बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nआइनस्टाइन बॉय s पोलका प्रिंट सासूल शर्ट\nआइनस्टाइन बॉय s पोलका प्रिंट सासूल शर्ट\nजिम & जॅम बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nबिकेर बोयस बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nलिटातले ग्रीन कीड बॉय s फ्लोरल प्रिंट सासूल फेस्टिव्ह वेदडींग लौनगे वेअर शर्ट\nओये बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nसिल्वर स्ट्रॅक बॉय s सॉलिड सासूल शर्ट\nसिल्वर स्ट्रॅक बॉय s प्रिंटेड सासूल शर्ट\nबीबाई बॉय s प्रिंटेड सासूल शर्ट\nपुम बॉय s सॉलिड सासूल शर्ट\nचालकलूस बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nबीओ कीड बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nसील्स बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nचालकलूस बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nपेयाचंबोयस बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://marathisaahitya.blogspot.com/2014/09/14.html", "date_download": "2018-08-18T10:31:52Z", "digest": "sha1:PTGVMH3RYB6HT3TKZ3XGMNKWRUIEDXJY", "length": 10451, "nlines": 110, "source_domain": "marathisaahitya.blogspot.com", "title": "मी मराठी : A Blog for Marathi Fun,Marathi Jokes,Marathi Poems,Marathi SMS and All about Marathi", "raw_content": "\nमी मराठी: - हा कुठलाही फ़ुकटचा कोड कॉपी करुन देण्यासाठी बनविन्यात आलेला नाही. तसेच जे लोकांना एखादा विनोद एकणे,वाचणे म्हणजे वेळेचा अपव्यय (मराठीत टाईमपास) वाटतो त्यांच्यासाठी सुधा नाही. या ब्लॉगवरील सर्व साहित्या हे कुठल्या ना कुठल्या मेलधुन आलेले आहे व ते एका ठीकाणी ठेवायचे म्हणुन हा सगळा उद्योग केलेला आहे.(कानात ह्ळुच :- सर्व चोरलेले आहे) दोन घडी हसायचे असेल तरच इथे वेळ घालवा अन्यथा गुगल आहेच..... Marathi Poems, Marathi Jokes, Marathi Poems, Marathi Shayari and more\nईमेल - इलेक्ट्रॉनिक मेल प्रणालीचा शोध, 14 वर्षीय मनसे शिव अय्यादुराई यांनी लावला होता.\nहि क्रांतिकारक डिजिटल संप्रेषण प्रणाली, ऑगस्ट 30, 2014 रोजी 32 वर्ष पूर्ण करते. भारतीय अमेरिकन शिव अय्यादुराई यांनी, न्यू जर्सी मध्ये लिविंग्स्टोन हायस्कूल येथे शिकत असताना, न्यू जर्सी च्या चिकित्सा विद्यापीठ आणि दंतचिकित्सा विभागामध्ये 1978 मध्ये interoffice मेल प्रणालीचा एक मोठा इम्यूलेशन विकसित करण्यास सुरुवात केली.\nमागे ऑगस्ट 30, 1982 मध्ये, अमेरिकन सरकारने संगणक प्रोग्राम मंजूर केला आणि याच प्रोग्राम मध्ये - इनबॉक्स, आउटबॉक्स, फोल्डर्स, पत्ते पुस्तिका, इ - मेल प्रणाली सर्व कार्ये कार्यरत केली गेली.\nAyyadurai हे खरोखरीच संशोधक होते किंवा नाही यावर 1982 मध्ये कॉपीराइट तंत्रज्ञान असूनही, एक वादंग आली होती.\nतथापि, Ayyadurai यांच्या शिष्यवृत्ती निबंध शब्द - 1981 मध्ये त्यांनी लिहिले होते \", उदाहरणार्थ, अप्रचलित होईल एक दिवस, इलेक्ट्रॉनिक मेल, एडिसन च्या बल्ब जसे देखील झिरपणे शकतो आणि ... लिखित काम खंड आपल्या रोजच्या जीवनात व्यापणे\" चालू आहे काय आहेत खरे Ayyadurai, एक HuffPost मुलाखतीची मध्ये प्रत्यक्षात सदोष म्हणाला समजावून आहे - ईमेल च्या डिस्कवरी आहे Newark, एनजे, युनायटेड गरीब शहरात केले होते \"एमआयटी किंवा लष्करी किंवा कोणत्याही मोठ्या संस्थेत केले, पण झाली नाही स्टेट्स. तो स्वत: संदर्भित म्हणून, 1978 मध्ये एक गडद घाबरणारा परदेशातून कायमची वस्ती करण्यासाठी येणारा किंवा आलेला मनसे \", 14 वर्षे जुन्या असायचे. तो वादंग मत आणि आरोप त्याच्या विनम्र पार्श्वभूमी तो पात्र प्रसिद्धी मिळणे शक्य नाही कारण जोडून \"दोन्ही आर्थिक आणि वंशिकदृष्टया prejudiced लोक,\" नियंत्रण मिळवता. Ayyadurai \", अमेरिकन स्वप्न\" ईमेल निर्मितीसाठी देखाव्यासाठी अंतर्गत येतो की स्पष्ट आणि संशोधन म्हणून त्याला आव्हान जे लोक असे वाटते की \"ऊर्ध्वगामी हालचाल आणि बदल घाबरत आहेत.\" तो सत्य अमेरिकन स्वप्न खरोखरच आहे की आहे की \"जोडले नावीन्यपूर्ण कोणिही करून, केव्हाही घडणे शकता [वस्तुस्थितीवर]. \"\n१०१ Puneri Paatya - पुणेरी पाट्या\nPuneri Paatya, Graphiti, Marathi Jokes, Mail Forwards आलेले मेल, सापडलेले फ़ोटो, कुणीतरी दिलेल्या कविता , सडलेले विनोद फ़ुटकळ साहित्य .\nइमेज निट पहाण्यासाठी त्यावर उंदराचे बटण दाबा.\nऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो\nमराठी किंवा हिंदी भाषेत सहजपणे, ‘ Android मोबाईल ‘...\nनरेंद्र मोदी यांचा शिक्षक दिन संदेश | Narendra Mod...\nईमेल - इलेक्ट्रॉनिक मेल प्रणालीचा शोध, 14 वर्षीय म...\nआजकाल WhatsApp सारख्या माध्यमामुळे लेखकांचे साहित्य जगभर पसरत आहे परंतु बरेच जण ते कुणा दुस-याच्या नावाने वा स्वताच्या नावानेही प्रसिद्ध करतात. ज्याचे त्याचे श्रेय त्यांना मिळालेच पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहोत. बर-याचदा असेही आढळले आहे कि कुठलातरी विनोद किंवा कविता अगदी पु.ल. किंवा सुरेश भट यांच्या नावाने पाठवली जाते. तरी वाचकांनी मूळ लेखकाचा शोध घ्यावा व असे साहित्य आढळल्यास प्रसिद्ध करणा-या वेबसाईटला कळवावे . आपल्याला आपले साहित्य या ब्लॉगवर कुणा दुसर-याच्या नावाने किंवा आपल्याला श्रेय न देता प्रसिद्ध केलेले आढळल्यास कृपया vikram.taware@gmail.com या आयडी वर संपर्क करा. या ब्लॉगवरील कुठलेही साहित्य आम्ही स्वतः लिहिलेले नाही व विक्रम तावरे हे लेखक नाहीत त्यामुळे मूळ लेखकाला श्रेय देण्यामध्ये आम्हाला कुठलीही आपत्ती नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/shiv-sena-internal-politics-35928", "date_download": "2018-08-18T11:01:59Z", "digest": "sha1:YMXCZIGRQQSSC5FXXZCKRLAKFXGL4LUQ", "length": 14465, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "shiv sena internal politics शिवसेनेत गटबाजीला उधाण | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 20 मार्च 2017\nनवी मुंबई - स्थायी समितीचे सभापती शिवराम पाटील आणि विरोधी पक्षाचे नेते विजय चौगुले यांच्यातील वाद शुक्रवारी सर्वसाधारण सभेत उफाळून आला. महापालिकेचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत मांडताना केलेल्या भाषणात सभापती पाटील यांनी चौगुले यांचे नाव न घेतल्याने शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी सभात्याग केला; तर शनिवारी स्थायी समितीच्या बैठकीतही शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी भाग घेतला नाही. यामुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली.\nनवी मुंबई - स्थायी समितीचे सभापती शिवराम पाटील आणि विरोधी पक्षाचे नेते विजय चौगुले यांच्यातील वाद शुक्रवारी सर्वसाधारण सभेत उफाळून आला. महापालिकेचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत मांडताना केलेल्या भाषणात सभापती पाटील यांनी चौगुले यांचे नाव न घेतल्याने शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी सभात्याग केला; तर शनिवारी स्थायी समितीच्या बैठकीतही शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी भाग घेतला नाही. यामुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली.\nअंतर्गत गटबाजीमुळे महापालिकेची हाती येणारी सत्ता निसटल्यानंतरही शिवसेनेतील गटबाजी संपलेली नाही. विरोधी पक्षनेते चौगुले व स्थायी समिती सभापती पाटील यांच्यात अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद शुक्रवारी उघड झाला. अर्थसंकल्प मांडताना पाटील यांनी चौगुले यांच्या नावाचा उल्लेख टाळल्यामुळे नाराज झालेल्या चौगुले यांनी महासभेच्या पुढील कामकाजात भाग घेतला नाही. चौगुले गटाच्या नगरसेवकांनी पक्षप्रतोद यांच्याकडे याबाबत नाराजी व्यक्त केली. पाटील शिवसेनेचे असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांप्रमाणे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला. चौगुलेंच्या नावाचा उल्लेख टाळल्यामुळे नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी शुक्रवारी सभात्याग केल्याने चौगुले समर्थकांची नाराजी सभागृहातही दिसून आली. शनिवारी झालेल्या स्थायी समितीच्या कामकाजातही पाटील यांच्या विरोधातील नाराजीचा सूर कायम होता. शिवसेनेचे प्रशांत पाटील व जगदीश गवते यांनी स्थायी समितीच्या कामकाजात भाग घेतला नाही. पक्षाची भूमिका ठरवताना सभापती विश्‍वासात घेत नाहीत, असा आरोप पाटील व गवते यांनी केला. पाटील यांच्याविरोधात चौगुले गटातील नगरसेवकांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत नाराजी पोहोचली असून थेट राजीनामे देण्याची तयारीही केल्याचे एका नगरसेवकाने सांगितले.\nराजशिष्टाचारानुसार सभापतींनी विरोधी पक्षनेत्यांचे नाव घ्यायला हवे होते. सभापती शिवराम पाटील व विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यात काही गैरसमज झाले असतील ते पक्षाच्या पातळीवर सोडवण्यात येतील; परंतु यामुळे शिवसेनेचे नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत असल्याच्या वृत्तात तथ्य नाही.\n-द्वारकानाथ भोईर, पक्षप्रतोद, शिवसेना\nएमआयएम नगरसेवक मतीन यांना अटक\nऔरंगाबाद- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला नकार देणारे औरंगाबादमधील एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना आज अटक करण्यात...\nपंकज भूसे यांचा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव\nसरळगांव - महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी होऊन दिलेल्या उद्दिष्टा पेक्षा जास्त वृक्ष लागवड करून उत्कृष्ट कामगिरी केल्याने...\nऔरंगाबाद : 'एमआयएम'च्या नगरसेवकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा\nऔरंगाबाद : महापालिकेत एमआयएम नगरसेकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या पाच नगरसेवकांविरोधात शुक्रवारी (ता.17) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयएम नगरसेवक...\nघरकामगार, बांधकाम मजूर महिलांची उपेक्षाच\nजळगाव : दिवसरात्र काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, पण डोक्‍यावर हक्काचं छत नाही...सतत कष्ट करूनही पदरी काहीच न पडल्यामुळे अनेकदा उपवास...\nताडगाव - मोफत आरोग्य शिबिरात गरिब व आदिवासी नागरीकांनी घेतला लाभ\nपाली - सुधागड तालुक्यातील ताडगाव येथे गुड डुअर्स चैरिटीज मुंबई, टिकेडिके परिसर विकास संघर्ष समिती आणि जय भैरवनाथ युवा मित्र मंडळ ताडगांव यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/loksatta-vyakti-vedh-mathilde-krim-1617999/", "date_download": "2018-08-18T11:13:13Z", "digest": "sha1:QPSBUBBA2BFVYK67SALABGXYHVXZUQV4", "length": 14081, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Vyakti Vedh Mathilde Krim | मॅथिल्ड क्रिम | Loksatta", "raw_content": "\nबेशिस्त वाहनचालकांना ९१ लाखांचा दंड\nपक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा\nपुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित\nजळगावमध्ये महाजन-खडसे गटबाजीची सर्वत्र बाधा\nएमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल\n२०१६ मध्ये ३६.७ दशलक्ष लोकांना एचआयव्हीची लागण झाली.\nएड्सविरोधात ज्यांनी व्रतस्थपणे संशोधन करून त्यातील उपचारांची प्रगती सतत साध्य केली, त्यांच्यापैकी एक म्हणजे मॅथिल्ड क्रिम. त्यांचे सोमवारी वयाच्या ९१व्या वर्षी अमेरिकेत निधन झाले. त्यांचे महत्त्वाचे काम केवळ विषाणू वैज्ञानिक एवढेच मर्यादित नव्हते, तर एड्ससारख्या दुर्धर रोगावर त्यांनी जनजागृती केली. जगात ३.९ कोटी लोक आतापर्यंत एड्सने मरण पावले आहेत. एड्सचा विषाणू माणसात पसरत असल्याचे दिसून आले तो काळ १९८०च्या सुमाराचा होता. त्या वेळी जनुक शास्त्रज्ञ व विषाणू शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी या रोगाविरोधात रणशिंग फुंकलेच, पण त्याच्या जोडीला त्यांनी एड्सग्रस्तांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. अमेरिकेतील एड्सविरोधी मोहिमेत त्या अग्रणी होत्या.\n२०१६ मध्ये ३६.७ दशलक्ष लोकांना एचआयव्हीची लागण झाली. हे प्रमाण २०१५च्या तुलनेत तीन लाखांनी कमी होते. मृतांची संख्याही १९ लाखांवरून १० लाखांवर आली याचे श्रेय क्रिम यांच्यासारख्या लढवय्यांनाच आहे. त्यांचा जन्म १९२६ मध्ये इटलीत झाला. जीवशास्त्र व जनुकशास्त्र हे त्यांचे आवडते विषय होते. यहुदी विद्यार्थ्यांशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर १९५४ मध्ये त्यांनी जन्माने जर्मन असलेले इस्रायली रेणवीय जीवशास्त्रज्ञ लिओ सॅश यांच्याबरोबर संशोधन सुरू केले. त्यात कर्करोगकारक विषाणूंचा अभ्यास करून काही संशोधन निबंध लिहिले होते. वेझमानचे विश्वस्त क्रिम यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या न्यू यॉर्कला गेल्या. त्या काळात अमेरिकेत एड्स जोरात होता. त्याला कारण जीवनशैली हे होते. त्यातून धडा शिकणे आवश्यक आहे हे त्याच वेळी क्रिम यांनी सांगितले होते. १९९२ मध्ये त्यांनी एड्स संशोधन संस्था सुरू केली. राजकारण, कला, करमणूक, समाज अशा क्षेत्रांतील धुरीणांनी यात त्यांना मदत केली. इटालियन, जर्मन, फ्रेंच व हिब्रू, इंग्रजी यासह अनेक भाषा त्यांना येत होत्या, त्यामुळे त्यांचे ज्ञान त्या सर्वांपर्यंत परिणामकारकतेने पोहोचवू शकल्या. ड्रग्ज व समलिंगी संबंधातून असणारे धोके त्यांनी सांगितले, पण या कारणास्तव या वर्गातील लोकांची छळवणूक होऊ नये या मताच्या त्या होत्या. त्या काळात एड्स झालेल्या व्यक्तींना अमेरिकेसारख्या प्रगत देशात काही राज्यांमध्ये वेगळे ठेवले जात होते, त्यावरून समाजजागृतीची किती आवश्यकता होती हेच लक्षात येते. त्यासाठी त्यांनी एलिझाबेथ टेलरसह अनेक नामांकितांची मदत घेऊन आपले संशोधन व सामाजिक काम पुढे नेले. अमेरिकी अध्यक्षांचा मेडल ऑफ फ्रीडम पुरस्कार हा सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना मिळाला होता. वैज्ञानिकाबरोबरच सामाजिक भान असलेल्या मोजक्या संशोधकांपैकी त्या होत्या यात शंका नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n पिंपरीत पित्याने दोन मुलांची हत्या करुन केली आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nIt's Official: नात्यावर शिक्कामोर्तब करत अखेर निक-प्रियांका म्हणाले....\nसहजीवनाचा पहिला टप्पा सर, थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा\nइम्रान खानच्या शपथविधीला सिद्धूंना मानाचे स्थान, घेतली लष्करप्रमुखांची गळाभेट\nमिनी एसयुव्हीसारखं डिझाईन असलेली नवीन रेनाँ क्विड वसूल करते तुमचा पै न पै\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nअंतर्गत वाहतुकीसाठी ट्रामचा पर्याय\nवाहनांना एक टोल माफ\nरेल्वेचे संगणकीय आरक्षण केंद्र पावणेतीन तास बंद राहणार\nस्वानंद देणारे शिक्षण निवडा\nवामनदादा कर्डकांना शाहिरीतून अभिवादन\nभूगावमधील हॉटेलमध्ये कोंबडय़ांच्या झुंजीवर जुगार\nपाणी पुरेना आणि म्हणे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-18T10:55:30Z", "digest": "sha1:Y6MCBQAYNL4QSQR3QHGCTESJK4JAFFKC", "length": 15521, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "सनातन संस्थेवर बंदी घाला; अशोक चव्हाणांची मागणी - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे…\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची…\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Maharashtra सनातन संस्थेवर बंदी घाला; अशोक चव्हाणांची मागणी\nसनातन संस्थेवर बंदी घाला; अशोक चव्हाणांची मागणी\nमुंबई, दि. १२ (पीसीबी) – देशाच्या धर्मनिरपेक्षतेवर सनातन संस्थेच्या लोकांकडून घाला घातला जात आहे. धर्माचे ध्रुवीकरण करण्याचा त्यांचा डाव आहे. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा हात आहे, त्यामुळे सनातन संस्थेवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.\nचव्हाण म्हणाले की, दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या धडक कारवाईत सुरुवातीला २० बॉम्ब आणि स्फोटके आढळून आली आहेत. त्यानंतर आणखी ५० बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी सनातनसंस्थेच्या वैभव राऊतसह इतर १४ लोकांना अटक करण्यात आली आहे.\nदरम्यान, राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी केलेल्या कारवाईत तीन हिंदुत्ववादी अतेरिक्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून काही स्फोटके आणि ती तयार करण्याची सामग्री जप्त करण्यात आली होती. त्यानंतर या तरुणांच्या चौकशीदरम्यान सुधन्वा गोंधळेकर याने आणखी शस्त्रसाठा लपवल्याची माहिती समोर आली.\nPrevious articleपोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम यांची शहराला शिस्त लावण्यास सुरुवात; पुण्यातील नामांकित पब आणि हुक्का पार्लरवर कारवाई\nNext articleसनातन संस्थेवर बंदी घाला; अशोक चव्हाणांची मागणी\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घाेषणा\nहिम्मत होती तर एकेकाने यायचे होते मग दाखवले असते; औरंगाबादेतील एमआयएम नगरसेवकाचा माज\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nजेएनयूतील विद्यार्थी नेता उमर खालिदवर गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न\nहॅकरने असे केले पुण्यातील कॉसमॉस बँकेतून ९४ कोटी गायब; व्हिसा कंपनीमुळे...\nपुण्यात दोन दिवसात ४८८ मद्‌यपी वाहन चालकांवर पोलिसांची कारवाई; न्यायालयात खटले...\nराहुल गांधींनी घेतले अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला हिंसक वळण; सोलापूरात १७ बसची तोडफोड\n‘जाळपोळ अन् हिंसाचार थांबवा, सरकार आरक्षण देईल’- नारायण राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A6-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81.html", "date_download": "2018-08-18T11:08:30Z", "digest": "sha1:4EFGFXPYHOZ5W4T7EBWU5CK2BWGRV3OA", "length": 21472, "nlines": 290, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | मशीद धार्मिक स्थळ नाही: सुब्रमण्यम स्वामी", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » मशीद धार्मिक स्थळ नाही: सुब्रमण्यम स्वामी\nमशीद धार्मिक स्थळ नाही: सुब्रमण्यम स्वामी\nनवी दिल्ली, [१५ मार्च] – मशीद हे धार्मिक स्थळ नसून फक्त एक इमारत आहे आणि त्यामुळे ती कधीही तोडता येऊ शकते, असे मत भाजपा नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले असून, यामुळे एक नवा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे सुब्रमण्यम स्वामी यांनी स्पष्ट केले आहे.\nडॉ. स्वामी यांच्या या विधानावरून गुवाहाटी येथे त्यांच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. मुस्लिम ज्या कोणत्या देशात गेले त्या देशाला त्यांनी १०० टक्के मुस्लिम राष्ट्र बनविले. इराकला १७ वर्षांमध्ये १०० टक्के मुस्लिम देश बनविले. परंतु, भारतात ८०० वर्षे मुस्लिमांचे आणि २०० वर्षे ख्रिश्‍चनांचे राज्य असूनही ८० टक्के हिंदू आहे, असे डॉ. स्वामी यांनी गुवाहाटी येथे एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. कोणतेही मंदिर हे प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर बनविले जाते. त्यानंतर त्या मूर्तीमध्ये भगवंत वास करतात आणि ते त्याचे स्वामी होतात, अशी मान्यता आहे. न्यायालयानेही ही बाब मान्य केली आहे. पूजा झाली किंवा नाही तरी मंदिर हे मंदिरच असते. परंतु, मशीद मुस्लिम धर्माचा आवश्यक हिस्सा नाही, असेही डॉ. स्वामी म्हणाले.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nराज्य पोलिस दलात १२ हजार पदे रिक्त\nमुंबई , [१५ मार्च] - राज्य पोलिस दलात १२,११५ पदे रिक्त असल्याची माहिती, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी विचारलेल्य प्रश्‍नाला ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.tarunbharat.com/news/551471", "date_download": "2018-08-18T10:25:22Z", "digest": "sha1:ST2KDJ3M6QNK3HNFLJLXFBHRBQ5TR7GR", "length": 8614, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘महानायक’चे प्रेक्षकांच्या मनावरील अधिराज्य कायम - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘महानायक’चे प्रेक्षकांच्या मनावरील अधिराज्य कायम\n‘महानायक’चे प्रेक्षकांच्या मनावरील अधिराज्य कायम\nपी.व्ही.आरमध्ये अमिताभ बच्चन फिल्म फेस्टीव्हलला प्रारंभ\nबच्चन वेडय़ांच्या अलोट गर्दीमध्ये डी.वाय.पी. सिटीमधील पी.व्ही.आर सिनेमाज्मध्ये गुरुवारी ‘अमिताभ बच्चन फिल्म फेस्टीवल’ला उत्साहात प्रारंभ झाला. ‘अमर अकबर अँथोनी’ या चित्रपटास झालेली बच्चन प्रेमींची गर्दी पाहता बॉलिवुडचा महानायक अमिताभ बच्चन यांचे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्या कायम असल्याचे दिसून आले.\nसुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिनानिमित्त डी.वाय.पी.सिटी, पी.व्ही.आर. सिनेमाज् आणि कोल्हापूरातील अमिताभ फॅन्स क्लब वर्ल्डवाइड व्हॉटस् ऍप गुप यांच्या संयुक्त विद्यमाने व डी.वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांच्या पुढाकाराने कोल्हापूरातील अमिताभ प्रेमींसाठी फिल्म फेस्टीवल चे आयोजन करण्यात आले आहे. डॉ.संजय पाटील व आमदार सुजित मिणचेकर यांच्या हस्ते केक कापून फेस्टीवलचे उदघाटन करण्यात आले. तसेच याप्रसंगी फेस्टीवलचे मुख्य आकर्षण असलेल्या अमिताभ बच्चन यांच्या सेल्फी पॉईंटचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले.\nअमिताभ फॅन्स क्लब वर्ल्डवाइड यांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकेतुन लोटस मेडिकल फाऊंडेशनच्या विशेष लहान मुलांसाठी तसेच मातोश्री वृध्दाश्रमातील लोकांसाठी ग्रुपच्या सदस्या स्मिता सावंत यांनी तब्बल 100 हून अधिक तिकीटे खरेदी करून त्यांना चित्रपट पाहण्याचा दुर्मिळ आनंद मिळाला.\nचित्रपट सुरु होण्यापुर्वी भव्य अशी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शो सुरू झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या एंट्रीला व सर्व डॉयलॉगना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या व शिट्टय़ांच्या गजरात भरभरून दाद दिली. अमिताभ यांचा हा भव्य दिव्य सुपरहिट सिनेमा त्या काळात रसिकांनी उचलून धरला होता. तोच थरार व उत्साह संपुर्ण शोच्या दरम्यान प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला.\nशिस्तबद्ध पद्धतीने अमिताभ बच्चन फिल्म फेस्टीवलचे आयोजन केल्याबद्दल डी.वाय.पी सिटीचे, पी.व्ही. आर सिनेमाज व कोल्हापूरातील अमिताभ फॅन्स क्लब वर्ल्डवाइड यांचे रसिक प्रेक्षकांनी कौतुक करून दाद दिली. याप्रसंगी डॉ संजय पाटील तसेच डी.वाय.पी सिटीचे सिध्दार्थ साळोखे,पी.व्ही.आर.चा अधिकारी वर्ग,अमिताभ फॅन्स क्लब वर्ल्डवाइड चे प्रमुख ऍड.इंद्रजित चव्हाण, आमदार सुजित मिणचेकर, अमरदिप पाटील, स्मिता सावंत, ऍड.सरिता भोसले, युवराज राणिंगा , नगरसेवक तौफिक मुलाणी, मिसेस महाराष्ट्र गौरी शिरोडकर तसेच अमिताभ बच्चन यांचा चाहता वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होता.ङ\n“लेक वाचवा’’ उपक्रमांतर्गत ठेव पावतीचे वितरण\nसंजय देशपांडे यांचा ‘स्वर गौरव’ किताबाने गौरव\nडिकेटीईच्या विद्यार्थ्यांनी बनविले सौर उर्जेवर नाविण्यपुर्ण प्रकल्प\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.starfriday2012.com/2018/02/blog-post_21.html", "date_download": "2018-08-18T10:15:53Z", "digest": "sha1:2W6WXPHFQVSQVSAWZBAKHOAWO6CO5RQB", "length": 7082, "nlines": 22, "source_domain": "www.starfriday2012.com", "title": "STARFRIDAY : जेष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांचे \"पानिपत\" द्वारे पुनरागमन!", "raw_content": "\nजेष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांचे \"पानिपत\" द्वारे पुनरागमन\nऔरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला खंबीर वारस मिळाला नाही त्यामुळे मराठ्यांनी उत्तर भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती. १७५० च्या दशकात मराठ्यांनी उत्तर भारतात बर्‍याच मोठ-मोठ्या मोहिमा काढल्या. पार पाकिस्तानातील अटकेपर्यंत आपले साम्राज्य प्रस्थापित केले व ७ ते ८ शतके राज्य करण्यार्‍या एकछत्री इस्लामी सत्तेला आव्हान दिले. थोरल्या बाजीरावाच्या कारकीर्दीपर्यंत उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. परंतु भारताच्या सीमा ओलांडून मराठे येऊ लागल्याने भारता बाहेरील इस्लामी सत्तांना मराठ्यांना अंकुश घालणे गरजेचे वाटले. इ.स. १७५८ मध्ये मराठ्यांनी दिल्लीवर कब्जा मिळवला व मुघलांना नाममात्र राज्यकर्ते बनवले. याच वेळेस अब्दालीचा मुलगा तिमूर शाह दुराणीला हाकलून लावले. मुस्लिम धर्मगुरुंनी याला आपल्या धर्मावरचे मोठे संकट मानले व मराठ्यांशी उघड उघड वैर पत्करले. उत्तर भारतात काही दशकात मिळवलेले वर्चस्व गमावण्याची भीती होती म्हणून मराठ्यांनी पण १ लाखाहून मोठी फौज उभारली व पानिपतकडे कूच केले आणि १४ जानेवारी १७६१ ला पानिपत मध्ये तिसरे घनघोर युद्ध झाले ज्यात मराठ्यांचा पराभव झाला.\nयाच युद्धावर आधारित निर्माते श्री अजय प्रभाकर कांबळी एक चित्रपट बनवीत असून त्याचे नाव आहे 'पानिपत'. सखोल संशोधनाच्या आधारे चित्रपटाची कथा-पटकथा लिहिलीय श्री अभय प्रभाकर कांबळी यांनी आणि 'पानिपत' चे दिग्दर्शनही तेच करणार आहेत. महत्वाची गोष्ट अशी की या चित्रपटाद्वारे जेष्ठ संगीतकार श्रीधर फडके संगीत-दिग्दर्शनात पुनरागमन करीत आहेत. बाबूजी म्हणजेच सुधीर फडके यांचे पुत्र असल्यामुळे संगीत रक्तातच आहे. संगीतातील कुठलंही शास्त्रोक्त प्रशिक्षण न घेताही ते उत्तम गायक आणि संगीतकारही आहेत. 'लक्ष्मीची पाऊले', 'पुत्रवती', 'विश्वविनायक', 'घराबाहेर', 'हृदयस्पर्शी' सारख्या अनेक मराठी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. मध्यंतरीच्या काळात काही कारणास्तव ते चित्रपटसंगीतापासून लांब राहिले होते. परंतु आता 'पानिपत' या भव्य-दिव्य चित्रपटाला ते संगीतबद्ध करीत आहेत. चित्रपटातील तीन गाण्यांचं ध्वनिमुद्रण झालंही असून त्यातील दोन गाण्यांना सुखविंदर सिंग आणि रिचा शर्मा या बॉलिवूडमधील प्रतिष्ठित गायकांचा आवाज लाभला आहे. सुखविंदर सिंग यांनी डॉ शिरीष गोपाळ देशपांडे यांनी लिहिलेल्या 'सांडले मराठी रक्त, राखण्या तख्त...' गाण्याच्या रेकॉर्डिंग नंतर श्रीधर फडके यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.\nश्री वेंकटेश्वरा मुव्हीज् इंटरनॅशनल ची निर्मिती असलेला व अभय कांबळी दिग्दर्शित 'पानिपत', ज्याद्वारे संगीतकार श्रीधर फडके यांचे चित्रपट संगीतात पुनरागमन होत आहे, चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच प्रारंभ होत असून तो पुढच्या वर्षी दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-08-18T09:58:12Z", "digest": "sha1:RI4KDPZ7LIYIHODWDW5M4X2PLNWBOVYF", "length": 9916, "nlines": 216, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बाश्कोर्तोस्तान - विकिपीडिया", "raw_content": "\nबाश्कोर्तोस्तान प्रजासत्ताकचे रशिया देशामधील स्थान\nस्थापना २३ मार्च १९१९\nक्षेत्रफळ १,४३,६०० चौ. किमी (५५,४०० चौ. मैल)\nघनता २९ /चौ. किमी (७५ /चौ. मैल)\nबाश्कोर्तोस्तान प्रजासत्ताक (रशियन: Республика Башкортостан; बाश्किर: Башҡортостан Республикаһы) हे रशियाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. हे प्रजासत्ताक रशियाच्या दक्षिण भागात उरल पर्वतरांग व वोल्गा नदी दरम्यान वसले आहे.\nआर्थिक दृष्ट्या बाश्कोर्तोस्तान रशियामधील सबळ प्रदेशांपैकी एक आहे.\nआल्ताय • इंगुशेतिया • उत्तर ओसेशिया-अलानिया • उद्मुर्तिया • अदिगेया • काबार्दिनो-बाल्कारिया • काराचाय-चेर्केशिया • कॅरेलिया • काल्मिकिया • कोमी • क्राइमिया१ • खाकाशिया • चुवाशिया • चेचन्या • तातारस्तान • तुवा • दागिस्तान • बाश्कोर्तोस्तान • बुर्यातिया • मारी एल • मोर्दोव्हिया • साखा\nआल्ताय • कामचत्का • क्रास्नोयार्स्क • क्रास्नोदर • खबारोव्स्क • झबायकल्स्की • पर्म • प्रिमोर्स्की • स्ताव्रोपोल\nअर्खांगेल्स्क • आमूर • इरकुत्स्क • इवानोवो • उल्यानोव्स्क • आस्त्राखान • ओम्स्क • ओरियोल • ओरेनबर्ग • कालिनिनग्राद • कालुगा • किरोव • कुर्गान • कुर्स्क • केमेरोवो • कोस्त्रोमा • चेलियाबिन्स्क • तुला • तांबोव • तोम्स्क • त्युमेन • त्वेर • निज्नी नॉवगोरोद • नॉवगोरोद • नोवोसिबिर्स्क • पेन्झा • प्स्कोव • बेल्गोरोद • ब्र्यान्स्क • मुर्मान्स्क • मागादान • मॉस्को • यारोस्लाव • रायझन • रोस्तोव • लिपेत्स्क • लेनिनग्राद • वोरोनेझ • वोलोग्दा • वोल्गोग्राद • व्लादिमिर • साखालिन • समारा • सारातोव • स्मोलेन्स्क • स्वेर्दलोव्स्क\nचुकोत्का • खान्ती-मान्सी • नेनेत्स • यमेलो-नेनेत्स\nमॉस्को • सेंट पीटर्सबर्ग\n१ क्राइमियावर युक्रेनने हक्क सांगितला असून बहुसंख्य आंतरराष्ट्रीय समुदाय क्राइमियाला युक्रेनचाच भाग मानतो.\nमध्य • अतिपूर्व • उत्तर कॉकासियन • वायव्य • सायबेरियन • दक्षिण • उरल • वोल्गा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ जानेवारी २०१७ रोजी १२:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%93%E0%A4%AC.html", "date_download": "2018-08-18T11:06:54Z", "digest": "sha1:5Y54EUJPGF7QAWHYFJQ5OIJUCNQ2L5ND", "length": 21567, "nlines": 292, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | संक्रातीला उडणार मोदी-ओबामा पतंग", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » गुजरात, ठळक बातम्या, राज्य » संक्रातीला उडणार मोदी-ओबामा पतंग\nसंक्रातीला उडणार मोदी-ओबामा पतंग\nबडोदा, [१२ जानेवारी] – येत्या प्रजासत्ताकदिनाचे प्रमुख पाहुणे असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे स्वागत करण्यासाठी भारत देश सज्ज झाला असतानाच, अवघ्या दोन दिवसांवर असलेल्या मकरसंक्रातीनिमित्त आकाशात झेपावण्यासाठी मोदी आणि ओबामा पतंगही सज्ज झाले आहेत.\nप्रामुख्याने गुजरातच्या बडोदा, सूरत, भरूच, राजकोट, अहमदाबाद आणि राज्यातील अन्य शहरांमधील बाजारपेठा मोदी आणि ओबामांचे छायाचित्र असलेल्या पतंगांनीच सजल्या आहेत. या दोन्ही पतंगांना गुजरातमध्ये प्रचंड मागणी होत आहे, अशी माहिती बडोदा पतंग विक्री आणि मालकी असोसिएशनचे सचिव मेहमूद कुभानभाई पतंगवाला यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.\nयावर्षी राज्यभरातील बाजारांमध्ये वेगवेगळ्या पतंगी आल्या आहेत. तथापि, मोदी आणि ओबामा यांचे छायाचित्र असलेल्या पतंगांना प्रचंड मागणी आहे. या पतंगांमुळे यावर्षी व्यवसायात बरीच वाढ झाली आहे, असा दावा त्यांनी केला.\nमूळचे भारतीय असलेले पण, सध्या कॅनडात वास्तव्यास असलेले कश्यप वैद्य हे संक्रातीच्या पतंग महोत्सवात सहभागी होण्यासाठी येथे आले आहेत. मला पतंगांचा प्रचंड शौक आहे. पण, कॅनडात पतंग उडत नसल्याने दरवर्षी मी येथे येत असतो, असे त्यांनी सांगितले.\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\n=आयोगाचा प्रस्ताव मान्य करा : सुप्रीम कोर्टात केंद्राची भूमिका= नवी दिल्ली, [१२ जानेवारी] - जगाच्या पाठीवरील विविध देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://marathiinfopedia.co.in/2018/08/09/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2018-08-18T09:55:28Z", "digest": "sha1:YG2FVWQ6H5MRJYUCBYASEHKUS3L32XMT", "length": 4164, "nlines": 79, "source_domain": "marathiinfopedia.co.in", "title": "मराठी म्हणी - MARATHI INFOPEDIA", "raw_content": "\nमराठी म्हणी म्हणजे विशिष्ट पद्धतीचे बोलणे. म्हणीच्या बाबतीत, एका पूर्ण विधानात बोलणाऱ्याच्या मनातील एक अनुभव व्यक्त झालेला असतो.\nचार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे – प्रत्येकाला अधिकार गाजविण्याची आयुष्यात संधी मिळतेच.\nघरोघर मातीच्या चुली – सर्वत्र परिस्थिती एकसारखी असते.\nकाखेत कळसा गावाला वळसा.\nअर्थ :- एका बाईचा विसरभोळेपणा दाखवला आहे. तिच्या कमरेवर कळशी असते; पण तिला त्याचा पत्ता नसतो. ती गावभर कळशी शोधत फिरत असते. जवळ असलेल्या वस्तूचा दूरवर शोध घेत राहणे हा अर्थ यातून व्यक्त होतो.\nऐकावे जनाचे, करावे मनाचे – सर्वांचा विचार घ्यावा व आपणांस योग्य वाटेल ते करावे.\nकरावे तसे भरावे – जसे बरेवाईट कृत्य करावे तसे त्याचे बरेवाईट परिणाम भोगायला तयार व्हावे.\nमुलाचे पाय पाळण्यात दिसतात – मुलगा मोठेपणी कसा निघेल याचा अंदाज लहानपणाच्या कृत्यावरुन करता येतो.\nहजीर तो वजीर – जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details/catd=TopStoryNews&id=952", "date_download": "2018-08-18T10:37:57Z", "digest": "sha1:ZFDZ2KSNX2ZXNC4LBXK2AOWQRHF67SCI", "length": 1839, "nlines": 14, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "", "raw_content": "\nऔरंगाबादेत वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणार्‍या एमआयएमच्या नगरसेवकाला चपलेने दिला चोप मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी दिला मुखाग्नी अटलजींनी केला अलविदा, अंत्यसंस्कार झाले देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर अटलजी मला मुलगी मानायचे- लता मंगेशकर राजकारणात माणसानं कसं वागावं याची प्रेरणा अटलजींकडून मिळायची- शिवराज पाटील चाकूरकर अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन, ९४ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पात ९५ टक्के पाणी मराठा कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी पुणे जिल्ह्यात आत्मक्लेश आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A6%E0%A5%A6", "date_download": "2018-08-18T09:59:44Z", "digest": "sha1:G7GOW7BJ3ETKY5RAA62CST2E4SR5RWJM", "length": 4858, "nlines": 182, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८०० - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १८०० मधील जन्म‎ (५ प)\n► इ.स. १८०० मधील मृत्यू‎ (२ प)\n\"इ.स. १८००\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १८०० चे दशक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/520716", "date_download": "2018-08-18T10:28:24Z", "digest": "sha1:NJJQ7JZPXEX5TTGO3SSAGQNQDPSIKLAQ", "length": 8822, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वादावादीमुळे सभागृहाचे वातावरण तापले - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वादावादीमुळे सभागृहाचे वातावरण तापले\nवादावादीमुळे सभागृहाचे वातावरण तापले\nविषयपत्रिकेवरील विषयावर बैठकीत चर्चा करण्यात यावी, वॉर्डमधील समस्या महापौर-उपमहापौर आणि आयुक्तांच्या कक्षात मांडाव्यात, अशी सूचना महापौर संज्योत बांदेकर यांनी केली. यावर आक्षेत घेत डॉ. दिनेश नाशीपुडी यांनी महापौरांच्या समोर विषयपत्रिका फेकून ठाण मांडण्याचा प्रयत्न केला. यामुळे सत्ताधारी आणि विरोधी गटात जोरदार वादावादी झाली. विषय पत्रिकेवरील विषय संपल्यानंतरच नगरसेवकांच्या समस्या जाणून घेण्याची सूचना सत्ताधारी गटनेते पंढरी परब यांनी केली.\nअखेर काही नगरसेवकांनी हस्तक्षेप करून या वादावर पडदा टाकून सभागृहाचे कामकाज सुरू करण्यात आले. सभागृहात चर्चा करताना अशाप्रकारे आसन सोडून महापौर-उपमहापौर आसनासमोर ठाण मांडणे अयोग्य आहे. यामुळे प्रत्येक सदस्याने सभागृहाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जर कोणी नगरसेवक सभागृहाचा सन्मान करत नसल्यास नगरसेवकांना निलंबित करण्याचा अधिकार महापौरांना आहे. यामुळे या अधिकाराचा वापर करून गैरवर्तन करणाऱया प्रत्येक नगरसेवकावर कारवाई करावी, अशी सूचना आमदार संभाजी पाटील यांनी मांडली.\nमजगाव येथे शिक्षण संस्थेची इमारत बांधण्यासाठी आमदार संजय पाटील यांनी महापालिकेकडे अर्ज दिला आहे. यामुळे याबाबत सभागृहात हा विषय चर्चेला घेण्यात आला होता. हा प्रस्ताव सभागृहात घेण्याची गरज काय असा मुद्दा आमदार फिरोज सेठ यांनी उपस्थित केला. यामुळे याबाबत शासनाचा आदेश असल्याची माहिती नगरयोजनाधिकारी ए. एस. कांबळे आणि महापालिका आयुक्त शशीधर कुरेर यांनी दिली. यामुळे शिक्षण संस्थांना इमारत बांधकाम परवानगी देण्याचा विषय महापालिका सभागृहात चर्चेला घेता येतो की नाही, याबाबत जोरदार चर्चा झाली. हा कायदा अन्यायकारक असल्याने अटी घालून इमारत बांधकाम परवानगी देण्यास काहीच हरकत नसल्याचा मुद्दा सत्ताधारी गटनेते पंढरी परब यांनी मांडला. यामुळे कायद्याच्या चौकटीत व सरकारी आदेशानुसार इमारत बांधकाम परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला.\nमाजी सभापती रामभाऊ पोतदार यांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव नगरसेवक अनंत देशपांडे यांनी मांडला. राजकीय व सामाजिक चळवळीत रामभाऊ पोतदार यांचा सहभाग होता, असे सांगून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी रामभाऊ पोतदार यांचा परिचय आणि राजकीय प्रवासाची माहिती देत माजी महापौर किरण सायनाक, सत्ताधारी गटनेते पंढरी परब, विरोधी गटनेते यांनी श्रद्धांजली वाहिली. नाटककार ऐणगी बाळाप्पण्णावर व पत्रकार गौरी लंकेश यांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव लेखा स्थायी समिती अध्यक्षा सरला हेरेकर यांनी मांडला. यावेळी मौन पाळून सभागृहाच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.\nसमाजासमोर आदर्श ठेवणारे आगळे अभियान\n‘त्या’ नराधमावर गंभीर गुन्हे दाखल करा\nशॉर्टसर्किटने आग लागून 2 एकर ऊस खाक\nता.पं.च्या ताळेबंद बैठकीत मराठीतून दिली माहिती\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathisaahitya.blogspot.com/search?updated-max=2014-09-01T12:57:00%2B05:30&max-results=5&reverse-paginate=true", "date_download": "2018-08-18T10:31:27Z", "digest": "sha1:MKRJDLYLXKV67NKH76X3C3ISAP5O5R4K", "length": 34883, "nlines": 294, "source_domain": "marathisaahitya.blogspot.com", "title": "मी मराठी : A Blog for Marathi Fun,Marathi Jokes,Marathi Poems,Marathi SMS and All about Marathi", "raw_content": "\nमी मराठी: - हा कुठलाही फ़ुकटचा कोड कॉपी करुन देण्यासाठी बनविन्यात आलेला नाही. तसेच जे लोकांना एखादा विनोद एकणे,वाचणे म्हणजे वेळेचा अपव्यय (मराठीत टाईमपास) वाटतो त्यांच्यासाठी सुधा नाही. या ब्लॉगवरील सर्व साहित्या हे कुठल्या ना कुठल्या मेलधुन आलेले आहे व ते एका ठीकाणी ठेवायचे म्हणुन हा सगळा उद्योग केलेला आहे.(कानात ह्ळुच :- सर्व चोरलेले आहे) दोन घडी हसायचे असेल तरच इथे वेळ घालवा अन्यथा गुगल आहेच..... Marathi Poems, Marathi Jokes, Marathi Poems, Marathi Shayari and more\nMeaning Of Shri Ganesha's Aarti - आपल्या लाडक्या गणेशाच्या आरती चा अर्थ\nआपल्या लाडक्या गणेशाच्या आरती चा अर्थ\nआरती चा अर्थ समजुन ती म्हणल्यावर अजुन\nचांगला देवा प्रतीचा भाव चांगला होतो.\nआणि हा अर्थ गणपती बसायच्या आत सगळ्या\nपर्यंत पोहचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करा.\nम्हणजे :- (सुख देणारा दुःख हरण करणारा)\nम्हणजे :-दुःखाचा समुळ नाश करतो.\nपुरवी प्रेम कृपा जयाची.\nम्हणजे :-त्याची कृपा झाली की प्रेमवर्षाव\nसर्वांगी सुन्दर उटी शेंदुराची \nम्हणजे:- गणेश सर्वांगाने सुंदर आहे.\nत्याने शेंदुराची उटी लावली आहे \nकंठी झळके माळ मुक्ताफळांची \nम्हणजे :- त्याच्या कंठात मोत्याची माळ\nजय देव जय देव जय मंगलमूर्ति \nदर्शनमात्रे मन : कामना पुरती \nम्हणजे:-हे देवा ,तुझा जयजयकार असो \nतु मंगलाची प्रत्यक्ष मूर्तीच आहेस \nदर्शनानेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात \nरत्नखचित फरा तुज गौरीकुमरा \nम्हणजे:- हे गौरीकुमारा रत्न जडवलेला\nमुकुटाचा पुढील भाग तुझ्या कपाळी आहे \nम्हणजे :-कुंकू आणि केशर मिश्रित\nचंदनाची उटी तु लावली आहे \nहिरेजडित मुकुट शोभतो बरा \nम्हणजे :-हिरयानी जडलेला मुकुट तुझ्या\nमस्तकावर शोभून दिसत आहे.\nरुणझुणती नूपुरे चरणी घागरिया \nम्हणजे :-तुझ्या पायांतील वाळ्यांतील\nघूंगरां चा रुणझुण असा मंजूळध्वनी होत आहे \nम्हणजे :-मोठे पोट असणारया ,पीतांबर\nनेसलेल्या, कमरेला नागाचे बंधन (कडदोरा) असलेला.\nसरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना \nम्हणजे :- सरळ सोंड व वाकडे तोंड असणारया,म्हणजे\nचालणारे व बोलणारे अशांना शिक्षा करुण\nत्याना सरळ मार्गावर आणणारया, त्रिनयना\nदास रामाचा वाट पाहे सदना \nम्हणजे :- हे गणपते मी रामाचा दास\n( समर्थ रामदासस्वामी) माझ्या घरी मी तुझी\nआतुरतेने वाट पहात आहे.\nसंकटी पावावे, निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना \nम्हणजे :- हे सुरवरवंदना - सर्वश्रेष्ठ देवां कडून वंदिल्या जाणारया हे गजानना, सर्व\nसंकट प्रसंगी तु मला प्रसन्न हो. माझा संभाळ कर.\nनिर्वाणी - अखेरीच्या, देहत्यागाच्या वेळी\nतु माझे रक्षण कर ही तुझ्या चरणी नम्र प्राथना .\n(संदर्भ :- आरतीसंग्रह अर्थासह सनातन लघुग्रंथ ).\nलक्षात ठेवा 'संकटी' पावावे संकष्टी नाही\n\" वडीलांस पत्र ...........\"\nप्रिय \" बाबा \" यांस ,\nआज थोडं एकट एकट वाटलं,\nबाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……\nचालायला लागल्यावर तुम्हीच पहिला हात दिला होतात,\nपण मी पुढे गेल्यावर नकळतच कधी दूर गेला होतात,\nआज, स्वतःच्या पायावर उभा असलो तरी धडपडल्यासारखं वाटलं.\nबाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……\nजेवताना काऊ चिऊ शिवाय कधी घास पोटात गेला नाही,\nआता तर चिऊ बघायला सुद्धा मिळत नाही,\nकाऊ चिऊ साठी पुन्हा एकदा रुसवासं वाटलं.\nबाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……\nलहानपणी तुमच्यासोबत पावसात भिजताना खूप मजा वाटायची,\nफाटका रेनकोट , तुटकी छत्री असूनही ती दोघांना पुरायची,\nआज , नवी कोरी छत्री असूनही पावसात थोडं भिजावस वाटलं.\nबाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……\nएकदा घरात एकटा असताना, सर्व घर रडून डोक्यावर घेतलं होत,\nपण तुम्ही धावत पळत येउन ' मी आहे 'असं सांगितलं होत,\nआज , स्टेशनच्या गर्दीत सुद्धा \" एकट एकट \" वाटलं .\nबाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……\nआठवतय… एकदा मी पडलो होतो,मला खूप लागलं होत ,\nत्यादिवशी तर पूर्ण आभाळ तुमच्या डोळ्यात दाटलं होत,\nआज , उगाचंच अडखळून पडावसं वाटलं…\nबाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……\nरात्री झोपताना तर तुमची मांडीच माझी \" उशी \" असायची ,\nतुम्ही नसताना आईच्या कुशीतही झोप नसायची,\nआज , पुन्हा एकदा तुमच्या जवळ झोपावं वाटलं….\nबाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……\nतुमचा हात सोडून शाळेत जाणे नकोसे वाटायचे,\nपण तोच हात पकडून घरी जाताना मात्र कसलेच भान नसायचे,\nआता मोठा झालो तरी \" तो \" हात पकडून शाळेत जावंसं वाटलं…\nबाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……\nतुमची आठवण मनातून कधीच जाऊ शकली नाही,\nआज , भरलेल्या आभाळाबरोबर डोळ्यात पाणी दाटल्यासारखं वाटलं….\nबाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून थोडसं रडावसं वाटलं……\nबाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून थोडसं रडावसं वाटलं……\nकिंग आर्थर नावाचा एक राजा होता. एका बेसावध क्षणी त्याच्या शेजारच्या राज्याच्या राज्याने त्याच्यावर हल्ला केला व त्यास कैद करून तुरुंगात बंदिस्त केले. पण तरुण आर्थरच्या विचारांनी त्याचे मतपरिवर्तन झाले अन त्याने आर्थरला जीवदान द्यायचे ठरवले. पण त्यासाठी त्याने आर्थरसमोर एक आव्हानात्मक अट ठेवली की तो आर्थरला एक प्रश्न विचारेल अन वर्षभरासाठी मुक्त करेल. तोवर जर आर्थर त्याचे उत्तर देऊ शकला तर आर्थरला कायमचे अभय नाही तर मृत्युदंड. तर तो प्रश्न होता की स्त्रियांना नेमके काय पाहिजे\nया प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता मी मी म्हणणाऱ्यांनी हात टेकले होते तर तरुण आर्थरकडून हे उत्तर शोधणे जाणे म्हणजे चमत्कारच ठरला असता. पण जीव वाचवायचा असेल तर उत्तर शोधलंच पाहिजे म्हणून तो स्वतःच्या राज्यात परतला. तिथे त्याने अनेकांकडे विचारणा केली त्यात त्याची राणी, नावाजलेले विद्वान, दरबारातले गणमान्य व्यक्ती एवढेच काय तर राज विदुषकाचेही मत घेतले. पण कुणीही या प्रश्नावर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. पण काही जणांनी सुचवले की राजधानीच्या शहराबाहेरच्या जंगलात जी म्हातारी चेटकीण राहते तिला जाऊन भेट, तिच्याशी सल्लामसलत कर, ती नक्कीच समर्पक उत्तर देऊ शकेल. पण तिचा सल्ला घेणे तुला चांगलेच महागात पडू शकते कारण ती चेटकीण केलेल्या उपकारांची अवाजवी किंमत वसूल करण्यासाठी कुप्रसिद्ध होती.\nहाताशी असलेला वेळ वेगाने संपत होता म्हणून अखेर आर्थरने तिच्याकडे जायचे ठरवले. चेटकिणीने आर्थरचा प्रश्न नीट ऐकून घेतला व धूर्तपणे उत्तरली, \"मी या प्रश्नाचे उत्तर अवश्य देईन पण त्याबदल्यात तुला माझी एक इच्छा पूर्णा करावी लागेल; तुझा मित्र लॅन्सलॉटला माझ्याबरोबर लग्न करावे लागेल.\" सर लॅनस्लॉट आर्थरचा जवळचा मित्र होता व त्याची ओळख एक कुलीन व्यक्तिमत्त्व व शूर योद्धा अशी होती. तिची हि मागणी ऐकून आर्थर सर्वार्थाने हादरला. ती चेटकीण जख्खड म्हातारी व दिसायला अत्यंत कुरूप होती. तिच्या मुखात केवळ एकच सुळा होता. तिच्या कंठातून चित्रविचित्र आवाज येत राहायचे व ति जिथे जाईल तिथे दुर्गंध पसरायचा. आर्थरने तिची मागणी धुडकावून लावली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या मित्राला जिवंतपणी नरकयातना भोगायला लावायचे पाप त्याला माथी घ्यायचे नव्हते. पण लॅन्सलॉटला जेव्हा हे कळले त्याने तडक चेटकिणीचा मागणी पूर्ण करण्याचा हट्ट आर्थरकडे धरला. तो म्हणाला माझ्या मित्राच्या प्राणांपुढे हा त्याग काहीच नाही. नाईलाजाने का होईना आर्थरने लॅन्सलॉटचे म्हणणे मान्य केले व लॅनस्लॉट व चेटकीण यांच्या विवाहाची घोषणा झाली.\nतेव्हा चेटकिणीने आर्थरचा जीव वाचवणारे उत्तर दिले की \"स्त्रीला तिच्या स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार हवा असतो\". हे उत्तर ऐकून सर्वांना जाणीव झाली की चेटकिणीने एका महान सत्याला उघड केले आहे. अन शेजारच्या राज्याच्या राजालाही हे उत्तर पटले व त्याने आर्थरला सर्व बंधनांतून मुक्त केले. या घटनेच्या आनंदोत्सवाबरोबरच चेटकीण व लॅन्सलॉट यांचा विवाह धूमधडाक्याने पार पडला.\nविवाहाच्या पहिल्या रात्री जड पावलांनी घाबरत घाबरतच लॅन्सलॉटने शयनकक्षात प्रवेश केला. पण समोरचे दृश्य बघून त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मंचकावर चेटकिणीऐवजी एक रूपगर्विता तरुणी बसली होती. धक्क्यातून सावरल्यावर त्याने त्या तरुणीला विचारले की हा बदल कसा काय झाला त्यावर ती म्हणाली की मी चेटकीण असतानाही तू माझ्याशी एवढा प्रेमाने वागलास म्हणून मी ठरविले आहे की दिवसातला अर्धाच काळ मी त्या विकृत चेटकिणीच्या रूपात राहीन व उरलेला अर्धा काळ या रूपात. आता मी कोणत्या वेळी चेटकिणीच्या रूपात राहायचे अन कोणत्या वेळी या रूपात राहायचे हे तुला ठरवायचे आहे.\nयावर लॅनस्लॉटच्या मनात दोन विरुद्ध पर्यायांमुळे विचारांचे द्वंद्व सुरू झाले. दिवसा तरुणी होऊ दिले तर सर्वांसमोर रुपवान पत्नी म्हणून मिरवता येईल पण रात्री एकांतात काय अन त्याउलट पर्याय निवडला तर कसे होईल \nआता कल्पना करा की लॅन्सलॉटच्या जागी तुम्ही आहात अन एका पर्यायाची निवड करायची आहे. तर अशा वेळी तुम्ही कोणता पर्याय निवडला असता \nतुमचा पर्याय ठरला असेल तर खाली लॅन्सलॉटचे उत्तर वाचा.\nकुलीन लॅन्सलॉट चेटकिणीला म्हणाला की आजपासून जरी तू माझी पत्नी असली तरी केव्हा कसे राहायचे हे ठरविण्याचा हक्क पूर्णपणे तुझाच आहे. तुला जेव्हा जसे आवडेल तेव्हा तू तशी राहा माझी कसलीही हरकत राहणार नाही. हे ऐकून चेटकीण लॅन्सलॉटवर खूप खूष झाली व तिने त्याला वचन दिले की ती चेटकिणीच्या रूपाचा कायमचा त्याग करेल कारण लॅनस्लॉटने तिला आदराने वागवले व तिच्या आयुष्याचे निर्णय घ्यायचा पूर्ण हक्क तिला दिला.\nबायकोला मनाप्रमाणे वागुद्या, नाहीतर गाठ चेटकीणीशी आहे.\nलेखक : चंद्रशेखर गोखले यांची.. एंक खूप छान कथा...\nकायद्याने दोघे वेगळे झाल्यावर त्याने राहतं घर विकायला काढलं\nब्रोकरच्या थ्रू तिच्या वडिलानीच ते घर विकत घेतलं..\nपून्हा घराची एक किल्ली त्याच्या हातात देत म्हणाले... मी माझ्या लेकीला ओळखतो तसा तुलाही..\nसगळ्या गोष्टी भावनेच्या भरात करतोस... अगदी माझ्या लेकीशी लग्न सुद्धा..\nपून्हा भावनेच्या भरात एकत्र यावसं वाटलं तर\nतसं व्हायला नको.. म्हणून ही रिकामी वास्तू तुझ्या हवाली करतो.. कधी वाटलं तर येऊन बसत जा\nभरल्या घरा पेक्षा रिकामं घर जास्त बोलतं आपल्याशी...\nभावनेपेक्षा विचार जास्त ठाम असतात विचारांवर ठाम झालास तर घेतल्या निर्णयाचा पश्र्चाताप होणार नाही.. निर्णय ठाम झाला की माझी किल्ली मला परत दे\nनाहीतर येऊन माझी मुलगी परत घेऊन जा...\nआणि खरच तो ढळत्या दुपारी रिकाम्या घरात बसायला लागला.. कलंडणारी ऊन्ह आपल्या घरात अशी ऐसपैस पसरतात त्याला माहीतच नव्हतं.. मावळतीचा वारा अख्ख्या घराचा ताबा घेतो याची त्याला कल्प्नाच नव्हती..\nएक चूकून राहिलेलं कँलेंडर होतं भिंतीवर वार्‍याने फडफडत होतं त्या फडफडण्याचा आवाज सुद्धा त्याला नवा होता... त्याने जवळ जाऊन बघितलं कसल्या कसल्या नोंदी त्यावर तिने करून ठेवल्या होत्या..कसली बीलं देण्याची तारीख, दूधाचा हिशोब, कामवालीचे खाडे,पेस्ट कंट्रोलची तारीख...सिलेंडर संपल्याची तारीख, ग्राहकचं सामान येण्याची तारीख...,इस्त्रीचे कपडे त्याचा हिशोब\nया कशातच तो सहभागी नव्हता... अगदी तिच्या महिन्याच्या तारखा... तारीख पुढे गेलीतर....\nत्याला गलबलूनच आलं या कशा कशातच आपण सहभागी नव्हतो.. ती एकटीचा डाव खेळत राहीली आणि आपण फक्त..तक्रार करत राहिलो..त्याला कँलेंडर समोर उभं राहणं शक्य होईना\nतो बेडरूम मधे आला त्याने खिडकी उघडली खिडकीत तिने हौसेनं लावलेली शेवंती होती वाळून वाळून झूरायला आलेली तिला भिजवयला तो आतूर झाला कातर झाला.. पाणी घालायला भांड नव्हतं त्याने कूंडीच सींक मधे नेली यथेछ्च पाणी शिंपडलं तहानलेली शेवंती गटा गटा पाणी प्यायली.. आणि तोच तृप्त झाला..\nतेव्ह्ढ्यात लँच कीने दार उघडल्याचा आवाज आला ती आली होती शेवंतीसारखीच .... तिला समोर बघून तो उनमळून गेला ... काय अवस्था करून घेतली आहे हिने... हिच्या आयुष्यातलं आपलं स्थान आपल्या लक्षात कसं आलं नाही ... की आपण लक्षात घेतलं नाही\nजिद्दीला पेटून भांडते तेंव्हा ती कुठल्याही टोकाला पोहोचते हे काय आपल्याला लग्नाआधी माहीत नव्हतं\nदोघांची नजरा नजर झाली... दोघे क्षणभरासाठी स्तब्ध\nती म्हणाली मी ही शेवंतीच न्यायला आले होते...\nतो म्हणाला आत्ताच पाणी दिलय... तिचं निथळणं संपेपर्यंत थांब...\nवाचण्यात आलेली एक सुंदर कविता\nथोडा break हवाय यार.\nधावपळीतून थोडेतरी क्षण विश्रांतीचे चार,\nथोडा break हवाय यार.\nकिती वाटलं ओझं तरीही\nजरी ते माझंच असलं तरी\nओझ ते ओझंच आहे.\nठेवू का हा भार \nथोडा break हवाय यार.\nघास सुखाचा खाण्यासाठी निवांत वेळ कुठंय.\nआज थोडं थांबू द्या,\nउद्या होईन ना मी तयार.\nथोडा break हवाय यार.\npresent वरच पडलंय पाणी...\nambitions चा गळ टाकून अदृश्य बसलंय कोणी.\nhome loan फेडता फेडता\nथोडा break हवाय यार.\nकळलंच नाही कधी पाऊस गेला\nआणि काय काय झाले बदल.....\nकळलंच नाही कधी झाली आपलेपणाची पानगळ...\nगर्दीत ओळखीच्यापैकी कुणालाच ओळखता येत नाही....\nतेव्हा VanHusen चा shirt हि थेंबभराच सुख देत नाही.\nsmile च्या formality मुळे प्रत्येकजण,\nकि space सबकुच वाटतेय बेकार....\nखरंच थोडा break हवाय यार...\nथोडा break हवाय यार...\n१०१ Puneri Paatya - पुणेरी पाट्या\nPuneri Paatya, Graphiti, Marathi Jokes, Mail Forwards आलेले मेल, सापडलेले फ़ोटो, कुणीतरी दिलेल्या कविता , सडलेले विनोद फ़ुटकळ साहित्य .\nइमेज निट पहाण्यासाठी त्यावर उंदराचे बटण दाबा.\nआजकाल WhatsApp सारख्या माध्यमामुळे लेखकांचे साहित्य जगभर पसरत आहे परंतु बरेच जण ते कुणा दुस-याच्या नावाने वा स्वताच्या नावानेही प्रसिद्ध करतात. ज्याचे त्याचे श्रेय त्यांना मिळालेच पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहोत. बर-याचदा असेही आढळले आहे कि कुठलातरी विनोद किंवा कविता अगदी पु.ल. किंवा सुरेश भट यांच्या नावाने पाठवली जाते. तरी वाचकांनी मूळ लेखकाचा शोध घ्यावा व असे साहित्य आढळल्यास प्रसिद्ध करणा-या वेबसाईटला कळवावे . आपल्याला आपले साहित्य या ब्लॉगवर कुणा दुसर-याच्या नावाने किंवा आपल्याला श्रेय न देता प्रसिद्ध केलेले आढळल्यास कृपया vikram.taware@gmail.com या आयडी वर संपर्क करा. या ब्लॉगवरील कुठलेही साहित्य आम्ही स्वतः लिहिलेले नाही व विक्रम तावरे हे लेखक नाहीत त्यामुळे मूळ लेखकाला श्रेय देण्यामध्ये आम्हाला कुठलीही आपत्ती नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i100712052749/view", "date_download": "2018-08-18T09:57:53Z", "digest": "sha1:2JLSUKDTJ4POM6X4UIPXBZIVPESESNIE", "length": 13997, "nlines": 127, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सुश्रुत संहिता - निदानस्थान", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|निदानस्थान|\nसुश्रुत संहिता - निदानस्थान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले .\nTags : sushrutasushruta samhitaVedआयुर्वेदसुश्रुतसुश्रुत संहिता\nसुश्रुत संहिता - वातव्याधि निदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले .\nसुश्रुत संहिता - मुळव्याध\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले .\nसुश्रुत संहिता - मुतखडा\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले .\nसुश्रुत संहिता - भगंदरनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले .\nसुश्रुत संहिता - कुष्ठनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले .\nसुश्रुत संहिता - प्रमेहनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले .\nसुश्रुत संहिता - उदरनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले .\nसुश्रुत संहिता - मूढगर्भनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले .\nसुश्रुत संहिता - विद्रधिनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले .\nसुश्रुत संहिता - विसर्पनाडीस्तनरोगनिदान’’\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले .\nसुश्रुत संहिता - गलगंडनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले .\nसुश्रुत संहिता - श्लीपदनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले .\nसुश्रुत संहिता - क्षुद्ररोगनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले .\nसुश्रुत संहिता - शूकदोषनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले .\nसुश्रुत संहिता - भग्नानानिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले .\nसुश्रुत संहिता - मुखरोगनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले .\nसुश्रुत संहिता - दंतगतरोग\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले .\nसुश्रुत संहिता - कंठरोग\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले .\nलांवेचे चणे लांवेंन खांवचे\n( गो.) हडळीला ठेवलेले चणे, हडळीनेंच खायचे. इतरांना ती गोष्ट शक्य होणार नाहीं. एखादें काम एखाद्या ठराविक युक्तिबुद्धीच्या माणसांकडूनच होण्यासारखें असलें व इतरांना तें जमण्यासारखें नसलें कीं म्हणतात.\nमृत माणसाचा पिंड भाताचा कां करतात\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%87", "date_download": "2018-08-18T09:59:34Z", "digest": "sha1:NDI6FU2GD5TSH2SXP6LQ5CFNYPK7EJU4", "length": 31010, "nlines": 213, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तारा बेनोडिक्ट रिचर्ड्‌स वनारसे - विकिपीडिया", "raw_content": "तारा बेनोडिक्ट रिचर्ड्‌स वनारसे\n(तारा वनारसे या पानावरून पुनर्निर्देशित)\nतारा बेनोडिक्ट रिचर्ड्‌स वनारसे\nडॉ. तारा वनारसे अथवा तारा रिचर्ड्स (मे १२, इ.स. १९३० - मे १२, इ.स. २०१०) या प्रसूतितज्‍ज्ञ डॉक्टर आणि मराठी भाषेतल्या लेखिका होत्या. मूळच्या महाराष्ट्रातील पुण्याच्या असलेल्या डॉ. वनारसे, मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेतल्यावर उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला गेल्या. इ.स. १९७० ते इ.स. १९७५ या काळात त्यांनी पुण्यात प्रॅक्टिस केली. मात्र त्यानंतर त्या इंग्लंडमध्ये स्थायिक झाल्या. त्यांचे वयाच्या ८० व्या वर्षी इंग्लंडमधील हेमेल हेम्पस्टेड येथे निधन झाले.\nडॉ. बेनोडिक्ट रिचर्ड्‌स (मृत्यू इ.स. १९९५) हे त्यांचे पती आणि मिरांडा रिचर्ड्‌स ही त्यांची कन्या होत. तारा वनारसे मराठी नवकथेच्या सुरुवातीपासून साक्षीदार होत्या. त्यांनी लिहिलेले ’कक्षा’ हे नाटक मराठी नाटकाला नवे वळण देणारे ठरले. इंग्लंडमधील सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात त्या सक्रिय होत्या. लंडन येथील महाराष्ट्र मंडळासाठी त्यांनी बरेच काम केले आहे. त्यांच्या तीन पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले होते.\nतारा वनारसे यांच्या आई या महर्षी कर्वे यांच्या आश्रमात वाढलेल्या बालविधवा होत्या. त्या आश्रमात हॉस्टेलवर देखरेख करीत असत. कृष्णाबाई व बाळूताई खरे(मालती बेडेकर) या त्यांच्या हाताखाली होत्या. पुढे ताराबाईंच्या आईने वनारसे यांच्याशी पुनर्विवाह केला.\nताराबाईंचे पती बेनोडिक्ट हे शल्यविशारद डॉक्टर होते. ताराबाईंच्या सासूबाई इंग्लंडमधील ओलिव्हिए या इंग्लंडमधील खानदानी कुटुंबातल्या होत्या.\nतारा वनारसे यांची 'श्यामिनी' ही कादंबरी रामायणातल्या शूर्पणखेला केंद्रस्थानी ठेवून लिहिली आहे. तिच्यातली प्रकरणे लक्ष्मण, ऊर्मिला, शंबुक, रावण आणि बिभीषण यांच्या नजरेतून सांगितली गेली आहेत. कक्षा हे नाटक इ.स. १९५५ साली म्हणजे ताराबाईंच्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी प्रसिद्ध झाले. त्याच जानेवारीत नाटकाचा पहिला प्रयोग आत्माराम भेंड्यांच्या कलाकार नाट्यसंस्थेने केला. त्यात आत्माराम भेंडे (दिग्दर्शक), आशा भेंडे, कुसुम कुलकर्णी, आणि सुधाकर कुलकर्णी यांनी भूमिका केल्या होत्या. नायिकेच्या मनातील आंदोलने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे हे नाटक त्या काळात विशेष गाजले होते. सूर ही कादंबरी जुळ्या मुलांच्या मनांतील सहकंप आणि त्याचे आजूबाजूच्या व्यक्तींवरील पडसाद या विषयावर होती. गुप्त वरदान हे एलिझाबेथ बोवेन व एच. ई. बेट्‌स या आणि काही इतर लेखकांच्या अनुवादित नवकथांचा संग्रह आहे.\nत्यांच्या बारा वाऱ्यावरचे घर या कवितासंग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.\nमृत्यूपूर्वी काही वर्षे तारा वनारसे पार्किन्सन विकाराने आजारी होत्या, तरी संगणकासमोर बसून त्यांनी लिखाण चालूच ठेवले होते.\nगुप्त वरदान (अनुवादित कथांचा संग्रह)\nतिळा तिळा दार उघड(प्रवासवर्णन)\nपहा : मराठीतील साहित्यिक डॉक्टर\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n· रुस्तुम अचलखांब · प्रल्हाद केशव अत्रे · अनिल अवचट · सुभाष अवचट · कृ.श्री. अर्जुनवाडकर · बाबुराव अर्नाळकर\n· लीना आगाशे · माधव आचवल · जगन्नाथ रघुनाथ आजगावकर · मंगला आठलेकर · शांताराम आठवले · बाबा आढाव · आनंद पाळंदे · नारायण हरी आपटे · मोहन आपटे · वामन शिवराम आपटे · विनीता आपटे · हरी नारायण आपटे · बाबा आमटे · भीमराव रामजी आंबेडकर · बाबा महाराज आर्वीकर\n· नागनाथ संतराम इनामदार · सुहासिनी इर्लेकर\n· निरंजन उजगरे · उत्तम कांबळे · शरद उपाध्ये · विठ्ठल उमप · प्रभाकर वामन उर्ध्वरेषे · उद्धव शेळके\n· एकनाथ · महेश एलकुंचवार\n· जनार्दन ओक ·\n· शिरीष कणेकर · वीरसेन आनंदराव कदम · कमलाकर सारंग · मधु मंगेश कर्णिक · इरावती कर्वे · रघुनाथ धोंडो कर्वे · अतुल कहाते · नामदेव कांबळे · अरुण कांबळे · शांताबाई कांबळे · अनंत आत्माराम काणेकर · वसंत शंकर कानेटकर · दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर · किशोर शांताबाई काळे · व.पु. काळे · काशीबाई कानिटकर · माधव विनायक किबे · शंकर वासुदेव किर्लोस्कर · गिरिजा कीर · धनंजय कीर · गिरीश कुबेर · कुमार केतकर · नरहर अंबादास कुरुंदकर · कल्याण कुलकर्णी · कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी · दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी · वामन लक्ष्मण कुलकर्णी · वि.म. कुलकर्णी · विजय कुवळेकर · मधुकर केचे · श्रीधर व्यंकटेश केतकर · भालचंद्र वामन केळकर · नीलकंठ महादेव केळकर · महेश केळुस्कर · रवींद्र केळेकर · वसंत कोकजे · नागनाथ कोत्तापल्ले · अरुण कोलटकर · विष्णु भिकाजी कोलते · श्रीपाद कृष्ण कोल्हटकर · श्री.के. क्षीरसागर · सुमति क्षेत्रमाडे · सुधा करमरकर\n· शंकरराव खरात · चांगदेव खैरमोडे · विष्णू सखाराम खांडेकर · नीलकंठ खाडिलकर · गो.वि. खाडिलकर · राजन खान · गंगाधर देवराव खानोलकर · चिंतामणी त्र्यंबक खानोलकर · संजीवनी खेर · गो.रा. खैरनार · निलीमकुमार खैरे · विश्वनाथ खैरे · चंद्रकांत खोत\n· अरविंद गजेंद्रगडकर · प्रेमानंद गज्वी · माधव गडकरी · राम गणेश गडकरी · राजन गवस · वीणा गवाणकर · अमरेंद्र गाडगीळ · गंगाधर गाडगीळ · नरहर विष्णु गाडगीळ · सुधीर गाडगीळ · लक्ष्मण गायकवाड · रामचंद्र भिकाजी गुंजीकर · वसंत नीलकंठ गुप्ते · अरविंद गोखले · दत्तात्रेय नरसिंह गोखले · मंदाकिनी गोगटे · शकुंतला गोगटे · अच्युत गोडबोले · नानासाहेब गोरे · पद्माकर गोवईकर ·\n· निरंजन घाटे · विठ्ठल दत्तात्रय घाटे · प्र.के. घाणेकर\n· चंद्रकांत सखाराम चव्हाण · नारायण गोविंद चापेकर · प्राची चिकटे · मारुती चितमपल्ली · विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर · वामन कृष्ण चोरघडे · भास्कर चंदनशिव\n· बाळशास्त्री जांभेकर · नरेंद्र जाधव · सुबोध जावडेकर · शंकर दत्तात्रेय जावडेकर · रामचंद्र श्रीपाद जोग · चिंतामण विनायक जोशी · लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी · वामन मल्हार जोशी · श्रीधर माधव जोशी · श्रीपाद रघुनाथ जोशी · जगदीश काबरे ·\n· अरूण टिकेकर · बाळ गंगाधर टिळक ·\n· विमला ठकार · उमाकांत निमराज ठोमरे ·\n· वसंत आबाजी डहाके\n· नामदेव ढसाळ · अरुणा ढेरे · रामचंद्र चिंतामण ढेरे ·\n· तुकाराम · तुकडोजी महाराज · दादोबा पांडुरंग तर्खडकर · गोविंद तळवलकर · शरद तळवलकर · लक्ष्मीकांत तांबोळी · विजय तेंडुलकर · प्रिया तेंडुलकर ·\n· सुधीर थत्ते ·\n· मेहरुन्निसा दलवाई · हमीद दलवाई · जयवंत दळवी · स्नेहलता दसनूरकर · गो.नी. दांडेकर · मालती दांडेकर · रामचंद्र नारायण दांडेकर · निळू दामले · दासोपंत · रघुनाथ वामन दिघे · दिवाकर कृष्ण · भीमसेन देठे · वीणा देव · शंकरराव देव · ज्योत्स्ना देवधर · निर्मला देशपांडे · कुसुमावती देशपांडे · गणेश त्र्यंबक देशपांडे · गौरी देशपांडे · पु.ल. देशपांडे · पुरुषोत्तम यशवंत देशपांडे · लक्ष्मण देशपांडे · सखाराम हरी देशपांडे · सरोज देशपांडे · सुनीता देशपांडे · शांताराम द्वारकानाथ देशमुख · गोपाळ हरी देशमुख · सदानंद देशमुख · मोहन सीताराम द्रविड ·\n· चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी · मधुकर धोंड ·\n· किरण नगरकर · शंकर नारायण नवरे · गुरुनाथ नाईक · ज्ञानेश्वर नाडकर्णी · जयंत विष्णू नारळीकर · नारायण धारप · निनाद बेडेकर · नामदेव\n· पंडित वैजनाथ · सेतुमाधवराव पगडी · युसुफखान महम्मदखान पठाण · रंगनाथ पठारे · शिवराम महादेव परांजपे · गोदावरी परुळेकर · दया पवार · लक्ष्मण रामचंद्र पांगारकर · विश्वास पाटील · शंकर पाटील · विजय वसंतराव पाडळकर · स्वप्ना पाटकर · प्रभाकर आत्माराम पाध्ये · प्रभाकर नारायण पाध्ये · गंगाधर पानतावणे · सुमती पायगावकर · रवींद्र पिंगे · द्वारकानाथ माधव पितळे · बळवंत मोरेश्वर पुरंदरे · केशव जगन्नाथ पुरोहित · शंकर दामोदर पेंडसे · प्रभाकर पेंढारकर · मेघना पेठे · दत्तो वामन पोतदार · प्रतिमा इंगोले · गणेश प्रभाकर प्रधान · दिलीप प्रभावळकर · सुधाकर प्रभू · अनंत काकबा प्रियोळकर ·\n· निर्मलकुमार फडकुले · नारायण सीताराम फडके · यशवंत दिनकर फडके · नरहर रघुनाथ फाटक · फादर दिब्रिटो · बाळ फोंडके ·\n· अभय बंग · आशा बगे · श्रीनिवास नारायण बनहट्टी · बाबूराव बागूल · रा.रं. बोराडे · सरोजिनी बाबर · बाबुराव बागूल · विद्या बाळ · मालती बेडेकर · विश्राम बेडेकर · दिनकर केशव बेडेकर · वासुदेव श्रीपाद बेलवलकर · विष्णू विनायक बोकील · मिलिंद बोकील · शकुंतला बोरगावकर ·\n· रवींद्र सदाशिव भट · बाबा भांड · लीलावती भागवत · पुरुषोत्तम भास्कर भावे · विनायक लक्ष्मण भावे · आत्माराम भेंडे · केशवराव भोळे · द.ता. भोसले · शिवाजीराव भोसले ·\n· रमेश मंत्री · रत्नाकर मतकरी · श्याम मनोहर · माधव मनोहर · ह.मो. मराठे · बाळ सीताराम मर्ढेकर · गंगाधर महांबरे · आबा गोविंद महाजन · कविता महाजन · नामदेव धोंडो महानोर · श्रीपाद महादेव माटे · गजानन त्र्यंबक माडखोलकर · व्यंकटेश दिगंबर माडगूळकर · लक्ष्मण माने · सखाराम गंगाधर मालशे · गजमल माळी · श्यामसुंदर मिरजकर · दत्ताराम मारुती मिरासदार · मुकुंदराज · बाबा पदमनजी मुळे · केशव मेश्राम · माधव मोडक · गंगाधर मोरजे · लीना मोहाडीकर · विष्णु मोरेश्वर महाजनी ·\n· रमेश मंत्री · विश्वनाथ काशिनाथ राजवाडे · विजया राजाध्यक्ष · मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष · रावसाहेब कसबे · रुस्तुम अचलखांब · पुरुषोत्तम शिवराम रेगे · सदानंद रेगे ·\n· शरणकुमार लिंबाळे · लक्ष्मण लोंढे · गोपाळ गंगाधर लिमये ·\n· तारा वनारसे · विठ्ठल भिकाजी वाघ · विजया वाड · वि.स. वाळिंबे · विनायक आदिनाथ बुवा · सरोजिनी वैद्य · चिंतामण विनायक वैद्य ·\n· मनोहर शहाणे · ताराबाई शिंदे · फ.मुं. शिंदे · भानुदास बळिराम शिरधनकर · सुहास शिरवळकर · मल्लिका अमर शेख · त्र्यंबक शंकर शेजवलकर · उद्धव शेळके · शांता शेळके · राम शेवाळकर ·\n· प्रकाश नारायण संत · वसंत सबनीस · गंगाधर बाळकृष्ण सरदार · त्र्यंबक विनायक सरदेशमुख · अण्णाभाऊ साठे · अरुण साधू · राजीव साने · बाळ सामंत · आ.ह. साळुंखे · गणेश दामोदर सावरकर · विनायक दामोदर सावरकर · श्रीकांत सिनकर · प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे · समर्थ रामदास स्वामी · दत्तात्रेय गणेश सारोळकर\n• अनंतफंदी • अनिल बाबुराव गव्हाणे • अनिल\n• बाबा आमटे • मुरलीधर देवीदास आमटे\n• अनंत काणेकर • किशोर कदम • गोविंद विनायक करंदीकर • विनायक जनार्दन करंदीकर • मनोहर कवीश्वर • माधव गोविंद काटकर • गोविंद वासुदेव कानिटकर • कान्होपात्रा • महादेव मोरेश्वर कुंटे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वि.म.कुलकर्णी • कृष्णदयार्णव • मधुकर केचे • महेश केळुस्कर • वसंत कोकजे • अरुण कोलटकर • बाळ कोल्हटकर • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • वामन रामराव कांत • ज्योती कपिले • कल्याण स्वामी • वामन रामराव कांत • अरुण कांबळे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • भगवान रघुनाथ कुळकर्णी • बाळकृष्ण हरी कोल्हटकर\n• संदीप खरे • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर\n• कवी गोविंद • प्रेमानंद गज्वी • गोविंदाग्रज • गिरीश • द.ल. गोखले • ग्रेस • पद्मा गोळे • माणिक गोडघाटे • राम गणेश गडकरी • नारायण मुरलीधर गुप्ते • चंद्रशेखर गोखले\n• वि.द.घाटे • दत्तात्रेय कोंडो घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे\n• सोपानदेव चौधरी • बहिणाबाई चौधरी\n• इलाही जमादार • माधव जुलियन • मनोहर जाधव • वामन गोपाळ जोशी\n• वसंत आबाजी डहाके\n• भा.रा. तांबे • लक्ष्मीकांत तांबोळी\n• कृष्णाजी केशव दामले • दासगणू महाराज • कृष्ण गंगाधर दीक्षित • भीमसेन देठे • सरला देवधर • ना.घ. देशपांडे\n• शाहीर पठ्ठे बापूराव • वासुदेव वामन पाटणकर • श्रीनिवास कृष्ण पाटणकर • निवृत्तीनाथ रावजी पाटील • नलेश पाटील • मंगेश पाडगांवकर • यशवंत • मेघना पेठे • सुरेश प्रभू • माधव त्रिंबक पटवर्धन • मोरेश्वर रामचंद्र पराडकर\n• अशोक बागवे • बी • बाबूराव बागूल • वसंत बापट • सरोजिनी बाबर • केशिराज बास • बा.भ. बोरकर • विश्वनाथ वामन बापट\n• रवींद्र सदाशिव भट • सुरेश भट • सदानंद भटकळ •\n• अरुण म्हात्रे • बाळ सीताराम मर्ढेकर • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • गजानन त्र्यंबक माडखोलकर • वा.गो. मायदेव • सुधीर मोघे • मोरोपंत • मुकुंदराज • मीराबाई • बाबाराव मुसळे • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• अजीम नवाज राही • श्रीकृष्ण राऊत • मनोरमा श्रीधर रानडे • श्रीधर बाळकृष्ण रानडे • पु.शि. रेगे • सदानंद रेगे •\n• दासू वैद्य • तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ\n• फ.मुं. शिंदे • शांता शेळके • राम शेवाळकर • श्रीधरकवी\n• इंदिरा संत • सौमित्र • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णा भाऊ साठे • विनायक दामोदर सावरकर • नारायण सुर्वे\nइ.स. १९३० मधील जन्म\nइ.स. २०१० मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०१८ रोजी २०:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%AD%E0%A4%B5-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%8A/", "date_download": "2018-08-18T10:59:12Z", "digest": "sha1:LY2XHPBZ42KGAWLBUFIYJSO6KSPKL4ME", "length": 16209, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "नालासोपाऱ्यातील वैभव राऊतच्या घरातून आणखी शस्त्रसाठा जप्त - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे…\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची…\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Maharashtra नालासोपाऱ्यातील वैभव राऊतच्या घरातून आणखी शस्त्रसाठा जप्त\nनालासोपाऱ्यातील वैभव राऊतच्या घरातून आणखी शस्त्रसाठा जप्त\nमुंबई, दि. १२ (पीसीबी) – नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकेप्रकरणी तिघांना अटक केल्यानंतर एटीएसने शनिवारी छापा टाकून आणखी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. दरम्यान, एटीएसने शनिवारी राज्यभर १६ जणांची कसून चौकशी केली. यातील काहींना चौकशीनंतर सोडून देण्यात आले होते.\nशुक्रवारी नालासोपाऱ्यातून गोवंश रक्षा समिती व हिंदू जनजागृती समितीशी संबंधित वैभव राऊत याला तर वसईतून शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एटीएसने राज्यभर विविध १६ जणांची कसून चौकशी केली. सूत्रांनुसार, एटीएसने वैभव राऊत याच्या निवासस्थानातून शनिवारी आणखी शस्त्रसाठा जप्त केला.\nत्यामध्ये ११ गावठी पिस्तुले, मॅगझिन्स, १ गावठी कट्टा, १ एअरगन, १० पिस्तूल बॅरल, ६ अर्धवट तयार पिस्तूल बॉडी, ६ पिस्तूल मॅगझिन, ३ अर्धवट मॅगझिन, ७ अर्धवट पिस्तूल स्लाइड, १६ रिले स्वीच, १ ट्रिझर मॅगझिन, अर्धवट तयार शस्त्राचे सुटे भाग धाडीत सापडले आहेत. त्याशिवाय १ चॉपर, १ स्टील चाकू, वाहनांच्या ६ नंबर प्लेट, हँडग्लोव्हज, बॉम्बनिर्मितीची माहिती असलेली पुस्तके, पेनड्राइव्ह, हँडबुक, अनेक हार्डडिक्स आदी वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. हे साहित्य आयईडी निर्मितीसाठीचे असल्याचा संशय तपास संस्थांना आहे.\nPrevious articleआदिवासी विभागात दोन लाख कोटींचा आरक्षण घोटाळा – उत्तम जानकर\nNext articleनेहरुनगरमध्ये तिघा टोळक्यांनी कोयत्याने वार करुन तरुणाला लुटले\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घाेषणा\nहिम्मत होती तर एकेकाने यायचे होते मग दाखवले असते; औरंगाबादेतील एमआयएम नगरसेवकाचा माज\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nभारतात दहशतवादी कारवायांचा कट रचल्याप्रकरणी दोन तरुणांना हैदराबादमधून अटक\nनागपूरात क्रेनने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील तीन विद्यार्थिनींचा मृत्यू\n२०२२ मध्ये भारत पहिली अंतराळ यात्रा काढेल; पंतप्रधान मोदींचा विश्वास\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून संपर्क क्रमांक जाहीर; नोंद घेण्याचे नागरिकांना आवाहन\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nती काय चिक्कीची फाइल आहे काय प्रकाश आंबेडकरांचा पंकजा मुंडेंना...\nवारीत साप सोडण्याविषयीच्या संभाषणावर विश्वास नाही – अजित पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/how-to-start-a-blog-writing-1629872/", "date_download": "2018-08-18T11:12:21Z", "digest": "sha1:GULHBZVOHD2FPF3KYQGBZSCT3G7MIXOF", "length": 16987, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "How to Start a Blog writing | लहान मुलाचं ब्लॉगिंग विश्व! | Loksatta", "raw_content": "\nबेशिस्त वाहनचालकांना ९१ लाखांचा दंड\nपक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा\nपुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित\nजळगावमध्ये महाजन-खडसे गटबाजीची सर्वत्र बाधा\nएमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल\nलहान मुलाचं ब्लॉगिंग विश्व\nलहान मुलाचं ब्लॉगिंग विश्व\nब्लॉगिंग करणारे फक्त मोठेच असतात असं मुळीच नाहीए.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nतुम्ही सगळे लहान मुलांसाठी असलेली पुस्तकं, मासिकं वाचत असणार, हो ना वाचायला तुम्हाला आवडतं, मग आता ब्लॉग वाचायला सुरुवात करा. आता तुम्ही म्हणाल, ‘ते ब्लॉगब्लिग आई-बाबा वाचतात, त्यांच्या गप्पांमध्ये कधीतरी ब्लॉगर्सबद्दल चर्चा ऐकतो आम्ही, पण ते आमच्यासाठी नसतं.’\nब्लॉगिंग करणारे फक्त मोठेच असतात असं मुळीच नाहीए. जगभर अनेक छोटी मुलं ब्लॉगिंग करतात. आणि त्यांच्या ब्लॉग्जना जगभर प्रचंड प्रतिसाद मिळतो. तुमच्यासारखीच छोटी मुलं, इतर मुलांसाठी लिहितात. यात अनुभव, त्यांच्या ट्रिप्स, शाळेतल्या गमतीजमती, त्यांची निरीक्षणं, त्यांनी केलेले पदार्थ आणि बरंच काही असतं. आजच्या भागात अशाच काही चिमुरडय़ा ब्लॉगर्सची ओळख करून देणार आहे.\nमार्था पेने ही तुमच्यासारखीच शाळेत जाणारी चिमुरडी स्कॉटिश मुलगी आहे. आज तिच्या ब्लॉगला जवळपास १० दशलक्ष हिट्स मिळालेले आहेत. काय लिहिते मार्था तर तिच्या शाळेतल्या गमतीजमती, तिचे अनुभव, शाळेत मिळणाऱ्या खाद्यपदार्थाबद्दल तर तिच्या शाळेतल्या गमतीजमती, तिचे अनुभव, शाळेत मिळणाऱ्या खाद्यपदार्थाबद्दल मुळात ती फूड ब्लॉग प्रकारातलं लिहिते. ३० एप्रिल २०१२ मध्ये शाळेच्या एका प्रॉजेक्टसाठी तिने लिहायला सुरुवात केली आणि बघता बघता त्याचा ब्लॉग तयार झाला. तर आठ वर्षांची बेस्टी लू ‘द अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ बेस्टी लू’ हा ब्लॉग चालवते. तिसरीतल्या बेस्टीला वाचनाची प्रचंड आवड आहे. त्यातूनच मग ती लिहायला लागली. मनातले विचार लिहावेत असं तिला वाटलं आणि सुरुवात झाली. मार्थाचे आई-बाबाही ब्लॉगर्स आहेत. त्यामुळे त्याच्या अनुभवाचाही तिला बराच फायदा होतो. ती तिच्या ट्रिप्सबद्दल, तिथल्या अनुभवांबद्दल लिहिते, फोटो शेअर करते. बेस्टी कविताही लिहिते. त्याही तिच्या ब्लॉगवर आहेत.\nजगभर जी मुलं ब्लॉग्स लिहितात, ती सगळी कविता, अनुभव, ट्रिप्सबद्दल लिहितात असं नाहीए बरं का दक्षिण लंडनमध्ये राहणारी मायलो मॅनिंग १० वर्षांची होती, जेव्हा तिनं आईला विचारलं की ‘लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीला सपोर्ट करणारा राजकीय ब्लॉग सुरू करता येईल का दक्षिण लंडनमध्ये राहणारी मायलो मॅनिंग १० वर्षांची होती, जेव्हा तिनं आईला विचारलं की ‘लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीला सपोर्ट करणारा राजकीय ब्लॉग सुरू करता येईल का’ देशात चालू असलेल्या राजकीय घडामोडींविषयी तिला जे काही समजलंय किंवा त्याविषयी जे तिला वाटतंय ते लिहिण्याची मायलोला इच्छा होती. त्यातूनच एप्रिल २०१० मध्ये तिचा LIBDEMCHILD हा ब्लॉग सुरू झाला. आज मायलो १८ वर्षांची आहे. हाच ब्लॉग ती आता ‘लिबरल गर्ल इज्ड १८’ या नावाने चालवते. गेली आठ वर्ष ती राजकीय ब्लॉग लिहिते आहे. तरुण पिढीला राजकारणी, राजकीय घडामोडींविषयी काय वाटतं, हे समजून घेण्यासाठी अनेक मोठेही तिचा ब्लॉग फॉलो करतात. सध्या ती किंग्स कॉलेजमधून राजकारण, तत्त्वज्ञान आणि कायदा यांचा अभ्यास करते आहे. ही तीन मुलं फक्त उदाहरणं आहेत. गुगलवर सर्च केलंत तर ब्लॉगिंग करणाऱ्या अनेक मुलांची माहिती तुम्हाला मिळू शकते. त्यांचे ब्लॉग्स तुम्ही वाचू शकता. फॉलो करू शकता. भारतातही आता हळूहळू मुलांच्या ब्लॉगिंगची सुरुवात होते आहे. त्यामुळे तुमच्या हातात असलेल्या गॅजेटचा वापर जगभरातल्या मुलांचे ब्लॉग वाचत त्यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी करता येऊ शकेल. मग, भरपूर वाचा, लिहा, व्यक्त व्हा\nबहुतेक सगळ्या ब्लॉगमध्ये प्रतिक्रिया द्यायला जागा असते. तुम्ही समजा एकदा ब्लॉग नियमित वाचत असाल आणि त्यावर प्रतिक्रिया लिहीत असाल तर इतर वाचकांशी तुमची मैत्री होते. म्हणजेच जगभरातल्या मुलांशी आणि मोठय़ांशीही तुम्ही कनेक्ट होता. गप्पा मारता. ही मैत्री छानच आहे, पण अशा मैत्रीचे काही वेळा धोकेही असतात. त्यामुळे नव्याने झालेल्या ऑनलाइन मित्र-मैत्रिणींना लगेच तुमचे वैयक्तिक तपशील सांगू नका. त्यांच्याविषयी आई-बाबांना सांगा. तुमच्या चॅटिंगमध्ये तुम्हाला काही खटकलं असेल तर त्याविषयी आई-बाबांशी मोकळेपणाने बोला. म्हणजे आवश्यक असेल तर ते तुम्हाला मदत करू शकतील.\nमार्था पेनेचा ब्लॉग वाचण्यासाठी : http://neverseconds.blogspot.in/\n(लेखिका समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n पिंपरीत पित्याने दोन मुलांची हत्या करुन केली आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nIt's Official: नात्यावर शिक्कामोर्तब करत अखेर निक-प्रियांका म्हणाले....\nसहजीवनाचा पहिला टप्पा सर, थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा\nइम्रान खानच्या शपथविधीला सिद्धूंना मानाचे स्थान, घेतली लष्करप्रमुखांची गळाभेट\nमिनी एसयुव्हीसारखं डिझाईन असलेली नवीन रेनाँ क्विड वसूल करते तुमचा पै न पै\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nअंतर्गत वाहतुकीसाठी ट्रामचा पर्याय\nवाहनांना एक टोल माफ\nरेल्वेचे संगणकीय आरक्षण केंद्र पावणेतीन तास बंद राहणार\nस्वानंद देणारे शिक्षण निवडा\nवामनदादा कर्डकांना शाहिरीतून अभिवादन\nभूगावमधील हॉटेलमध्ये कोंबडय़ांच्या झुंजीवर जुगार\nपाणी पुरेना आणि म्हणे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/national-film-awards-%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%82%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-18T10:53:41Z", "digest": "sha1:D7QJRQLPWGNPZNZBUWHDKIQJDRXNSGUF", "length": 8445, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "National film awards : ‘कच्चा लिंबू’ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nNational film awards : ‘कच्चा लिंबू’ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट\nनवी दिल्ली : संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीचे लक्ष लागून राहिलेल्या मानाच्या ६५ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीच्या शास्त्री भवनातील पीआयबी कॉन्फरन्स रुम चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. चित्रपट क्षेत्रातील विविध विभागांसाठी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यासाठी नेमण्यात आलेल्या परिक्षकांच्या ज्युरीचे नेतृत्व दिग्दर्शक शेखर कपूर यांनी केले होते.\n६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांच्या खात्यातही काही पुरस्कार आले आहेत. ‘मृत्यूभोग’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर, सुयश शिंदेच्या ‘मयत’ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सर्वोत्कष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार प्रसाद ओकच्या ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाला जाहीर झाला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि रवी जाधव यांच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांसोबतच राष्ट्रीय पुरस्कारांच्या ज्युरींचीही मने जिंकली असे म्हणायला हरकत नाही.\n* बेस्ट मराठी फिल्म- कच्चा लिंबू\n*बेस्ट हिंदी फिल्म- न्यूटन\n*स्पेशल मेन्शन अवॉर्ड- अभिनेता पंकज त्रिपाठी (न्यूटन)\n*बेस्ट अॅक्ट्रेस- श्रीदेवी (मॉम)\n*बेस्ट स्पेशल इफेक्ट्स- बाहुबली: द कन्क्लुजन\n*बेस्ट अॅक्शन- बाहुबली: द कन्क्लुजन\n*बेस्ट नॉन फिचर फिल्म- वॉटर बेबी\n*बेस्ट एज्युकेशनल फिल्म- द गर्ल्स वी वर अँड द वुमन वी आर\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसातारा : खटाव तालुक्‍यात पाण्यासाठी वणवण\nNext articleशेतकऱ्यांना खते, बियाणांचा पुरवठा वेळेत करा\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा केरळ दौरा, ५०० कोटी रुपयाची मदत जाहीर\nकेरळमध्ये उद्भवलेल्या पूरग्रस्त परिस्थितीस राष्ट्रीय आपत्ती घोषित करा: राहुल गांधी\nप्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी दिसणार मोहनजींच्या भूमिकेत\nभारत गणेशपुरे आणि सागर कारंडेचा आगळावेगळा झांगडगुत्ता \nविहिरीत सापडला शेतकऱ्याचा मृतदेह\nकेरळच्या मदतीस सरसावले अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, या राज्यांनी केली ‘एवढी’ मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/now-jet-airways-can-travel-lifetime-53777", "date_download": "2018-08-18T10:29:34Z", "digest": "sha1:PAL2GFDGIJ36KMIX7LZPDN7FX6DUG7AO", "length": 12233, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Now Jet Airways can travel for a lifetime! ‘त्याला’ आता जेट एअरवेजने करता येणार आयुष्यभर मोफत प्रवास! | eSakal", "raw_content": "\n‘त्याला’ आता जेट एअरवेजने करता येणार आयुष्यभर मोफत प्रवास\nसोमवार, 19 जून 2017\nनवी दिल्ली - सौदी अरेबियाहून भारतातील कोचीला निघालेल्या जेट एअरवेजच्या विमानात केरळच्या एका गरोदर महिलेने एका अपत्यास जन्म दिल्याची घटना घडली. या महिलेचे नाव काय हे समजू शकलेले नाही. मात्र जेट एअरवेजच्या विमानात जन्म घेतलेल्या या मुलाला आता जेट एअरवेजकडून आयुष्यभर मोफत हवाई प्रवास करता येणार आहे.\nनवी दिल्ली - सौदी अरेबियाहून भारतातील कोचीला निघालेल्या जेट एअरवेजच्या विमानात केरळच्या एका गरोदर महिलेने एका अपत्यास जन्म दिल्याची घटना घडली. या महिलेचे नाव काय हे समजू शकलेले नाही. मात्र जेट एअरवेजच्या विमानात जन्म घेतलेल्या या मुलाला आता जेट एअरवेजकडून आयुष्यभर मोफत हवाई प्रवास करता येणार आहे.\n9 डब्ल्यू 569 या विमानाने आज पहाटे 2.55 वाजता येथून उड्डाण केले होते. या विमानातून एक गरोदर महिला प्रवास करत होती. प्रवासादरम्यान तिला प्रसूतिवेदना सुरू झाल्यानंतर याची कल्पना तिने विमानातील कर्मचाऱ्यांना दिली. हे विमान अरबी समुद्रावरून प्रवास करत असतानाच तिने एका बाळास जन्म दिला. या विमानातून एक परिचारिकाही प्रवास करत होती. तिने यासाठी मदत केली. नंतर या विमानाची दिशा बदलून ते मुंबईकडे आणण्यात आले. तेथे उतरताच सदर महिला व तिच्या नवजात बाळास तातडीने रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nजेट एअरवेजच्या नियमानुसार, गरोदर महिलेकडे प्रवास करण्याबाबत डॉक्टरांचे फिटनेस प्रमाणपत्र असेल तर 36 आठवड्यापर्यंतची गरोदर महिला प्रवास करू शकते. त्यामुळे या केरळच्या महिलेला प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. आता मात्र बाळाने हवेतच जन्म घेतल्याने त्याचे राष्ट्रीयत्व कोणते, याची माहिती मिळालेली नाही. मात्र जेट एअरवेजच्या विमानात हवेतच जन्म घेतल्याने\nत्या मुलाला आयुष्यभर मोफत प्रवास करता येणार आहे.\n'डाॅ. टोणगावकर मेश' जागतिक संशोधकांच्या यादीत\nधुळे : स्वित्झर्लंडमधील \"स्प्रिंजर' या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या \"मॅनेजमेंट ऑफ ऍबडॉमीनल हर्नियाज' (Management of Abdominal Hernia's) या...\nकेरळातील वादळामुळे कोकणात मच्छीमारी ठप्प\nरत्नागिरी - केरळमधील वादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर झाला आहे. सलग पाच दिवस मच्छीमारी ठप्प झाली असून दहा ते बारा कोटी रुपयांची फटका बसला आहे....\nबोर्डी - पोलिस ठाण्यासाठी हक्काची इमारत लवकर व्हावी\nबोर्डी - पालघर पोलिस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रातील घोलवड पोलिस ठाण्याच्या कार्यालयाच्या प्रस्तावीत इमारतीसाठी जमीन मिळत नसल्याने पोलिस ठाण्याचा...\nसिंहगडावर स्वातंत्र्यदिनी झेंड्याचे ध्वजारोहण\nखडकवासला - सिंहगडावर स्वातंत्र्यदिनी मोठ्या झेंड्याचे ध्वजारोहण बुधवारी करण्यात आले. जमिनीवरील 760 मीटर उंचीवरील ध्वजाचे सिंहगडावर स्वातंत्र्य...\nIndependence Day : ध्वजवंदन जेव्हा ड्युटी बनते..\nमुंबई : सर्वसामान्यपणे स्वातंत्र्य दिन आणि आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, समाजसेवक, स्वातंत्र्यसैनिक, मंत्री आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/dashakriya-housefull-goa-esakal-news-54485", "date_download": "2018-08-18T10:30:36Z", "digest": "sha1:N3JMPI26IHRXE3VI6LY37LF5JXLSCRIK", "length": 15013, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dashakriya housefull in goa esakal news गोवा चित्रपट महोत्सवात 'दशक्रिया' हाऊसफुल्ल ! | eSakal", "raw_content": "\nगोवा चित्रपट महोत्सवात 'दशक्रिया' हाऊसफुल्ल \nगुरुवार, 22 जून 2017\nपणजी : नुकत्याच संपन्न झालेल्या '१० व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' संजय कृष्णाजी पाटील लिखित आणि संदीप भालचंद्र पाटील दिग्दर्शित 'दशक्रिया' या चित्रपटाचा खेळ आयोजित करण्यात आला होता. ६४ व्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांचा या महोत्सवात समावेश होता. या महोत्सवात दर्दीप्रेक्षक, आणि मान्यवरांसोबतच गोयंकरांचे लक्ष वेधत 'दशक्रिया'ने हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळवीत बाजी मारली. या महोत्सवाला मनोज जोशी, अभिनेत्री - निर्माती कल्पना विलास कोठारी, अभिनेत्री उमा सरदेशमुख, आशा शेलार, अदिती देशपांडे, 'रंगनील'चे नील कोठारी इत्यादी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.\nपणजी : नुकत्याच संपन्न झालेल्या '१० व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' संजय कृष्णाजी पाटील लिखित आणि संदीप भालचंद्र पाटील दिग्दर्शित 'दशक्रिया' या चित्रपटाचा खेळ आयोजित करण्यात आला होता. ६४ व्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांचा या महोत्सवात समावेश होता. या महोत्सवात दर्दीप्रेक्षक, आणि मान्यवरांसोबतच गोयंकरांचे लक्ष वेधत 'दशक्रिया'ने हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळवीत बाजी मारली. या महोत्सवाला मनोज जोशी, अभिनेत्री - निर्माती कल्पना विलास कोठारी, अभिनेत्री उमा सरदेशमुख, आशा शेलार, अदिती देशपांडे, 'रंगनील'चे नील कोठारी इत्यादी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.\n'दशक्रिया' या चित्रपटाने ३ राष्ट्रीय पुरस्कार, ११ राज्य शासन पुरस्कार, ४ संस्कृती कला दर्पण पुरस्कार आणि २ पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार असे सन्मान मिळविले आहेत. तसेच नुकत्याच जाहीर झालेल्या ९व्या 'निफ' या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला तब्बल १३ विभागांमध्ये नामांकनं जाहीर झाली आहेत.\nदशक्रिया' चित्रपटाला 'जोगवा', 'पांगिरा', '७२ मैल एक प्रवास' सारख्या दर्जेदार चित्रपटांचे लेखक - प्रस्तुतकर्ते संजय कृष्णाजी पाटील यांचे पटकथा, संवाद, गीत लेखन लाभलं असून जेष्ठ साहित्यिक बाबा भांड यांची 'दशक्रिया' ही बहुचर्चित साहित्यकृती, संदीप भालचंद्र पाटील यांचं दिग्दर्शन आणि सोबतीला अनुभवी सकस कलावंत तंत्रज्ञांची फौज या जमेच्या बाजूंमुळे 'दशक्रिया'चा कॅनवास अधिक फुलून आला आहे.\nया चित्रपटात जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, अदिती देशपांडे, मिलिंद शिंदे, मिलिंद फाटक, उमा सरदेशमुख, आशा शेलार, नंदकिशोर चौघुले, संतोष मयेकर, उमेश मिटकरी, पंकज चेंबूरकर, अनुश्री फडणीस, रसिका चव्हाण, संदीप जुवाटकर, विद्यासागर अध्यापक, प्रशांत तपस्वी, अनिल राबाडे, उमेश बोलके, संस्कृती रांगणेकर, राहुल शिरसाट, सोनाली मगर, अभिजित झुंझारराव, गणेश चंदनशिवे, प्रफुल्ल घाग, मनोहर गोसावी, तृप्ती अटकेकर, विनोद दोंदे बालकलाकार आर्य आढाव, विनायक घाडीगावकर, कैवल्य पिसे, क्षितिजा पंडित, श्रेया चौघुले, यांच्यासोबत जवळपास १५० नवोदितांना अभिनयाची संधी मिळाली असून आनंदा कारेकर, जयवंत वाडकर, कल्पना कोठारी यांनी विशेष भूमिका केल्या आहेत.\nMaratha Kranti Morcha : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री आंदोलन\nपुणे : मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे सोमवारपासून (ता.20) मराठा आरक्षणासाठी आणि विविध मागण्यांसाठी पुणे विभागीय आयुक्त...\nटाकवे बुद्रुक - सावित्रींच्या लेकींना दुस-या टप्प्यात पंधरा सायकलींचे वाटप\nटाकवे बुद्रुक - आंदर मावळाच्या मिंडेवाडी तील ठाकरवस्ती, चावसरवस्ती, जाधववाडीतून पायपीट करीत येणा-या विद्यार्थ्यांसह सावित्रींच्या लेकींना दुस-या...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\n#PriyankaNickEngagement प्रियंका-जोनसचा पार पडला 'रोका'\nमुंबई : गेले अनेक दिवस चर्चेत असलेल्या अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि तिचा प्रियकर अमेरिकन गायक निक जोनास यांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली...\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/election-commission-may-disqualify-candidates-if-they-fail-produce-expense-bills-17984", "date_download": "2018-08-18T11:08:19Z", "digest": "sha1:YEFEH6X45J6RVYRY6HPBIO5P3OHZLZK3", "length": 14045, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Election Commission may disqualify candidates if they fail to produce expense bills खर्च सादर न केल्यास विजयी उमेदवार अपात्र | eSakal", "raw_content": "\nखर्च सादर न केल्यास विजयी उमेदवार अपात्र\nरविवार, 27 नोव्हेंबर 2016\nमुंबई : अर्थव्यवस्थेच्या शुद्धीकरणाची मोहीम सध्या देशात जोरात सुरू असताना राज्य निवडणूक आयोगानेही नियमांचे शस्त्र परजले आहे. नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निकालानंतर 30 दिवसांच्या आत जो उमेदवार खर्च सादर करणार नाही तो निवडून आला असला तरी अपात्र घोषित केला जाईल.\nमुंबई : अर्थव्यवस्थेच्या शुद्धीकरणाची मोहीम सध्या देशात जोरात सुरू असताना राज्य निवडणूक आयोगानेही नियमांचे शस्त्र परजले आहे. नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निकालानंतर 30 दिवसांच्या आत जो उमेदवार खर्च सादर करणार नाही तो निवडून आला असला तरी अपात्र घोषित केला जाईल.\nराज्य निवडणूक आयुक्‍त ज. स. सहारिया यांनी या वर्षीपासून नियमांचे काटेकोर पालन होणार असल्याचे स्पष्ट केले असून, पक्षांना 60 दिवसांच्या आत खर्चाचे विवरणपत्र सादर करावे लागणार आहे. राजकीय पक्षांनी हिशेब सादर करण्यात हयगय केल्यामुळे नुकताच त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांवर सुमारे अडीच लाख लोकप्रतिनिधी निवडून पाठवले जातात. निवडणुका सुरू झाल्या आहेत. नगर परिषद आणि नगरपालिकेच्या सध्याच्या टप्प्यात 150 ठिकाणी मतदान होणार आहे. या मतदारसंघात उमेदवार असलेल्या प्रत्येकाला त्याचा स्वत:चा, पक्षाचा आणि त्याच्या मित्रमंडळाने केलेल्या खर्चाचा लेखाजोखा आयोगाला सादर करावा लागणार आहे. यापूर्वीही 30 दिवसांच्या आत खर्चाचा तपशील सादर करणे बंधनकारक होते. मात्र, कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश या वेळी प्रथमच देण्यात आले आहेत. नगरपालिका या लोकशाहीच्या प्राथमिक शाळा असल्याने सुधारणांचा कार्यक्रम तेथून राबवणे आवश्‍यक असल्याचे आयोगाने ठरवले आहे.\nया वर्षी महाराष्ट्राच्या गावपातळीवर होणाऱ्या निवडणुकांत प्रथमच संगणकाचा पूर्ण वापर करण्यात आला आहे. नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी सर्व उमेदवारी अर्ज या वेळी पूर्णत: संगणकाद्वारे स्वीकारण्यात आले. गावपातळीवरील निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी हा सामान्यत: तालुक्‍याच्या ठिकाणी असतो. तेथे संगणकाची माहिती देण्यासाठी विशेष पथके आयोगाने नेमली होती. सायबर कॅफेतील कर्मचाऱ्यांना अर्ज कसा भरायचा यांची माहिती देण्यात आली होती. सर्व अर्ज संगणकाद्वारो दाखल करणारे महाराष्ट्र हे कदाचित पहिलेच राज्य असावे. तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे लोकशाहीत पारदर्शकता येण्यास मदत होईल, असा विश्‍वास सहारिया यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केला.\nभाषणात मोठी ताकद आहे.. : बबन साळगांवकर\nसावंतवाडी : भाषणात मोठी ताकद आहे त्याच वक्तृत्वाचा फायदा घेऊन तब्बल 23 दिवसांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे पहिल्यांदा आमदार बनले आणि त्यांनी नंतर...\nपंकज भूसे यांचा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव\nसरळगांव - महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी होऊन दिलेल्या उद्दिष्टा पेक्षा जास्त वृक्ष लागवड करून उत्कृष्ट कामगिरी केल्याने...\nचिंचवडमध्ये रविवारी रंगणार महिला प्रेरणा संमेलन\nवाल्हेकरवाडी - स्वयंसिद्धा प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड शहर) आणि प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि. 19 ऑगस्ट) चिंचवड...\nदूध भुकटी उद्योग संकटात ; शेतकऱ्यांना वाढीव दराची प्रतीक्षाच\nसोलापूर : दूध व दुग्धजन्य पदार्थांची देशांतर्गत गरज भागवून शिल्लक दुधापासून भुकटी बनविली जाते. परंतु, सद्यःस्थितीत महाराष्ट्रात 30 हजार टन तर...\nताडगाव - मोफत आरोग्य शिबिरात गरिब व आदिवासी नागरीकांनी घेतला लाभ\nपाली - सुधागड तालुक्यातील ताडगाव येथे गुड डुअर्स चैरिटीज मुंबई, टिकेडिके परिसर विकास संघर्ष समिती आणि जय भैरवनाथ युवा मित्र मंडळ ताडगांव यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.neu-presse.de/hi/category/wissenschaft/", "date_download": "2018-08-18T10:58:17Z", "digest": "sha1:LOITEI6SG7XD7WTZ6ARV5PTGUIAHWHVR", "length": 8477, "nlines": 118, "source_domain": "www.neu-presse.de", "title": "Wissenschaft Archives - नई Presse.de समाचार और प्रेस विज्ञप्ति", "raw_content": "नई Presse.de समाचार और प्रेस विज्ञप्ति\nजर्मनी और दुनिया से नवीनतम समाचार\nसंरक्षण, स्थिरता और ऊर्जा\n2016 2017 कृषि व्यापार वकील वकीलों \" काम कर नियोक्ता कर्मचारी ऑटो बर्लिन ब्लूटूथ बादल कोचिंग डाटा रिकवरी डिजिटलीकरण Erlangen का आनंद स्वास्थ्य हनोवर Hartzkom HL-स्टूडियो संपत्ति आईटी सेवा बच्चे विपणन मेसट Pazarci कर्मचारी समाचार पीआईएम Rechtsanwaelte वकील यात्रा एसएपी फास्ट फूड स्विट्जरलैंड सुरक्षा सॉफ्टवेयर नौकरी का प्रस्ताव प्रौद्योगिकी वातावरण कंपनी छुट्टी यु एस बी उपभोक्ता क्रिसमस उपहार\nडिफ़ॉल्ट भाषा के रूप में सेट करें\nArchivmeldungen महीना चुनिए अगस्त 2018 जुलाई 2018 जून 2018 मई 2018 April 2018 मार्च 2018 फरवरी 2018 जनवरी 2018 दिसंबर 2017 नवंबर 2017 अक्टूबर 2017 सितंबर 2017 अगस्त 2017 जुलाई 2017 जून 2017 मई 2017\nइलेक्ट्रिक कार चार्ज कुंजी\nविदेशी भाषाओं को जानने\nरंग भरने वाली किताबें\nक्रिप्टो मुद्राओं के कार्य\nकॉपीराइट © 2018 | द्वारा वर्डप्रेस थीम एमएच विषय-वस्तु\nइस साइट में कुकीज़ का उपयोग करता, सबसे अच्छा संभव कार्यक्षमता के लिए प्रदान करने के लिए. और अधिक पढ़ें कुकीज़ के उपयोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/450929", "date_download": "2018-08-18T10:27:47Z", "digest": "sha1:5TTD5ME6WS7CTGCPGG4O66JMG2CF2OA6", "length": 6044, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सोन्याच्या बंद खाणी पुनर्जीवित करणार सरकार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » सोन्याच्या बंद खाणी पुनर्जीवित करणार सरकार\nसोन्याच्या बंद खाणी पुनर्जीवित करणार सरकार\nब्रिटिश राज कालावधीतील सोन्याच्या बंद खाणी पुन्हा सुरू करण्याच्या योजनेवर केंद्र सरकार काम करत आहे. गेल्या 15 वर्षात देशातील अनेक खाणी बंद झाल्या आहेत. यामध्ये 120 अब्ज रुपयांचे सोने असल्याचे सांगण्यात येते. देशात मोठय़ा प्रमाणात सोन्याची आयात करण्यात येत असून त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सध्या जगात चीननंतर भारत सोन्याचा मोठा आयातदार देश आहे.\nसरकारकडून चालविण्यात येणाऱया मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने डिपॉझिट्सच्या योग्य आकलनासाठी कर्नाटकातील कोलार गोल्ड फील्ड्सचा अभ्यास करण्यास प्रारंभ केला आहे असे सरकारी अधिकाऱयांनी म्हटले. यापूर्वी कोलार फिल्ड्सचे नियंत्रण भारत गोल्ड माइन्स लिमिटेडजवळ होते. सरकारने एसबीआय कॅपिटलला या अभ्यासाचे काम सोपविले आहे. या अभ्यासात कर्मचाऱयांची थकीत रक्कम आणि प्राधिकरणाकडून कंपनीला किती निधी द्यायचा आहे, याची माहिती गोळा करण्यात येणार आहे.\nकच्च्या तेलानंतर आयातीच्या बाबतीत भारत सोन्यावर अधिक प्रमाणात अवलंबून आहे. विदेशातून सोने खरेदी करण्यासाठी प्रतिवर्षी साधारण 200 अब्ज रुपये खर्च करण्यात येतात. घरगुती बचत करण्यासाठी अनेक भारतीय सोन्यात गुंतवणूक करतात. आशियातील तिसऱया मोठय़ा अर्थव्यवस्थेतील लाखो नागरिक सोन्यात गुंतवणूक करतात. भारत प्रतिवर्षी साधारण 900 ते 1,000 टन सोन्याची आयात करतो.\n‘महिंद्रा’ रस्ते बांधकाम उपकरण क्षेत्रात\nजेरोम पॉवेल फेडरल रिझर्व्हचे नवीन प्रमुख\nबँकिंग क्षेत्रातील विक्रीमुळे पडझड सुरूच\n10 पैकी केवळ तीन पेटन्ट अर्ज भारतीयांचे\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/519509", "date_download": "2018-08-18T10:28:30Z", "digest": "sha1:Q2RMBIZQX4DGB5FLSHSLS7FROCZYYN4O", "length": 3256, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "या आठवडय़ात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nयेत्या शुक्रवारी वरुण धवनची दुहेरी भूमिका असलेला ‘जुडवा 2’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर मराठीमध्ये ‘बापजन्म’, ‘घुमा’ आणि ‘जिंदगी विराट’ हे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हॉलीवूडमध्ये एकही चित्रपट प्रदर्शित होणार नाही.\nसंकलन : अपूर्वा सावंत, मुंबई\n‘कच्च लिंबू’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित\nनिपुण धर्माधिकारी सांगणार ‘बापजन्मा’ची कथा\nमिथुन चक्रवर्ती यांचे छोटय़ा पडद्यावर पुनरागमन\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/527528", "date_download": "2018-08-18T10:28:32Z", "digest": "sha1:DDEHF7HNHZ7KPDSL6NMNTMHTC6DOL2R7", "length": 8900, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमणे हटविण्याची कारवाई - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमणे हटविण्याची कारवाई\nअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमणे हटविण्याची कारवाई\nहिवाळी अधिवेशनाची तयारी जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने चालविली आहे. या अंतर्गत बैठकांचे सत्र आणि पाहणी दौरेही सुरू आहेत. तसेच मंत्रीमहोदय शहरात दाखल होणार असल्याने सुशोभीकरणाचा आभास निर्माण करण्यासाठी विविध रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि फुटपाथवर थाटण्यात आलेली दुकाने हटविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. मंगळवारी आरपीडी कॉर्नर ते पिरनवाडी क्रॉसपर्यंत मोहीम राबविण्यात आली.\nखानापूर रोडचे रुंदीकरण झाल्यानंतर याठिकाणी फेरीवाले, फळ विपेत्यांनी अतिक्रमण करून ठाण मांडले आहे. त्याचप्रमाणे विविध मॉलमध्ये येणाऱया ग्राहकांसाठी खानापूर रोड पार्किंगतळ बनला आहे. यामुळे येथील अतिक्रमणे हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे उद्यमबाग येथील उद्योजकांनी केली होती. मात्र याची दखल घेण्यात आली नाही. पण दि. 13 नोव्हेंबरपासून होणाऱया हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खानापूर रोड येथील अतिक्रमणे व फळविपेत्यांना हटविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.\nमंगळवारी सकाळी आरपीडी कॉर्नर येथून मोहिमेस सुरूवात करण्यात आली. पिरनवाडी क्रॉसपर्यंत असलेली खोकी, फळ विपेते, फेरीवाले आणि पार्क करण्यात आलेली वाहने हटविण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी काही फळ विपेत्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण विरोधाला न जुमानता ही कारवाई करण्यात आली. यामुळे खानापूर रोडने मोकळा श्वास घेतला असून, वाहनधारक आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कारवाईवेळी महसूल निरीक्षक सी. आय. बी. पाटील, मल्लिकार्जुन गुंडप्पण्णावर व अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी उपस्थित होते.\nअधिवेशनासाठी मंत्रीमंडळासह आमदार व अधिकाऱयांचा ताफा शहरात दाखल होणार आहे. बेळगाव शहर सुंदर असल्याचे दाखविण्यासाठी महापालिका प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवून आटापिटा चालविला आहे. मंत्रीमहोदय विमानाने येत असल्याने सांबरा विमानतळ ते राणी चन्नम्मा चौकपर्यंतच्या रस्त्याशेजारील खोकी हटविण्याच्या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. सांबरा रोड, जेएनएमसी रोड, गांधीनगर, संकम हॉटेल परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन ते कोल्हापूर क्रॉसपर्यंतच्या रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून घेण्यासाठी खोकेधारक, फळ विपेते आणि फेरीवाल्यांना सूचना देण्यात येत आहेत. दोन दिवसात अतिक्रमणे हटवून घ्यावीत, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा महापालिकेच्यावतीने देण्यात आला आहे. महसूल निरीक्षक अनिल बिर्जे, शेखर पुजारी आदींसह अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी मोहिमेमध्ये सहभागी झाले होते.\nउड्डाणपुलाचे गर्डर ठेवण्याचे काम आजपासून सुरू\nशहरामध्ये नशिल्या पदार्थांचे जाळे पसरविणाऱया टोळीला अटक\nखानापूर तालुक्यात दोन अपघातात तीन युवक ठार\nबळ्ळारी नाल्यातील जलपर्णी काढली स्व-खर्चातून\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/537329", "date_download": "2018-08-18T10:28:34Z", "digest": "sha1:AERQU5GTAUELQMY7NW6TOH3O4LBJXNIW", "length": 7298, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोपर्डी निकाल ; सहा मिनिटांत कोर्टात नेमके काय झाले ? - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » विविधा » कोपर्डी निकाल ; सहा मिनिटांत कोर्टात नेमके काय झाले \nकोपर्डी निकाल ; सहा मिनिटांत कोर्टात नेमके काय झाले \nऑनलाईन टीम / अहमदनगर :\nसंपूर्ण राज्याचा हादरवून टाकणाऱया कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तीन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. अहमदनगर सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी हा निकाल दिला आहे.\n13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून जवळपास दीड वर्ष हा खटला चालला. या दीड वर्षांच्या युक्तीवादानंतर आज शिक्षा सुनवण्यात आली.परंतु आज न्यायालयाने अवघ्या 6मिनिटात निकाल दिला.\nसहा मिनिटांत कोर्टात नेमके काय झाले \nन्यायाधेश सुवर्णा केवले सकाळी 11ः23मिनिटांनी न्यायालयात दाखल झाल्या. तीन्ही आरोपी जितेंद्र शिंदे,नितीश भैलुमे आणि संतोष भवाळ यांना कोठडय़ात बसवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना न्यायाधीशांसमोर उभे करण्यात आले होते.\nआरोपी जितेंद शिंदेने न्यायाधीशांकडे पाहून हात जोडले. त्यानंतर न्यायधीशांनी सर्व आरोपींची नावे आणि वय वाचून दाखवले आणि लगेचच शिक्षा वाचण्यास सुरूवात केली. सर्वात आधी आरोप होते त्यामध्ये कटाकास्थान, पोक्सो, बलात्कार आणि हत्या अशा विविध आरोंपानुसार शिक्षा सुनावली. सर्वात आधी विविध कलमांनुसार जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर कलम 302 अर्थात खून आणि कलम 376 अर्थात बलात्कार यासाठी तीन्ही आरोपींना जन्मठेप आणि फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेला ज्यावेळी दोषी धरण्यात आले होते, यावेळी तो म्हणाला होता शिक्षा एक दिवस काय आणि हजर दिवस काय ,शिक्षाही शिक्षाच असते.मात्र आज हाच जितेंद शिंदे न्यायलयासमोर हात जोडून उभा होता. त्यानंतर कोर्टाने आरोपींन फाशी सुनावली त्यानंतर पीडित मुलीच्या आईने एकच हंबरडा फोडला.दरम्यान, न्यायाधीशांनी आरोपींना गुह्यात वापरेले मोबाईल, दुचाकी यांचा लिलाव करण्याचेही आदेश दिल. त्याची जी रक्कम असेल,ती सरकारदप्तरी जमा होईल. आजच्या सुनावणीसाठी आरोपींपैका एकाचाही वकील उपस्थित नव्हता.\nआता शिक्षकांनाही द्यावी लागणार परिक्षा \nकोकणासह राज्यभरात गौरीचे उत्साहात आगमन\n तरूणाच्या पोटातून निघाले 263 नाणी आणि 12 ब्लेड\nडॉ. के. सिवन यांना ‘लोकमान्य टिळक सन्मान’\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/people-of-pargaon-village-protest-for-not-giving-airport-works-1631341/", "date_download": "2018-08-18T11:11:18Z", "digest": "sha1:COA5NCFZU2CPULEXJVCEG2VK6UKHAFXO", "length": 16071, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "People of Pargaon Village protest for not giving airport works | पारगावात प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन | Loksatta", "raw_content": "\nबेशिस्त वाहनचालकांना ९१ लाखांचा दंड\nपक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा\nपुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित\nजळगावमध्ये महाजन-खडसे गटबाजीची सर्वत्र बाधा\nएमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल\nनवी मुंबई विमानतळ प्रकल्पात १० गावे विस्थापित होत आहेत.\nपारगावातील हजारो प्रकल्पग्रस्त मंगळवारी रस्त्यावर उतरले.\nविमानतळाची कामे न दिल्याने असंतोष\nनवी मुंबई विमानतळ प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात असलेल्या पारगावातील हजारो प्रकल्पग्रस्त मंगळवारी रस्त्यावर उतरले. यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. पारगावातील एकाही प्रकल्पग्रस्ताला भरावाची कामे दिलेली नाहीत आणि इतर ठिकाणी भराव टाकला जात असल्याने पारगाव गावाच्या आजूबाजूला भरतीच्या पाण्याची पातळी वाढू लागली आहे. या गावात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याबाबत सिडको कोणतीही उपाययोजना करत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून नाराजी व्यक्त केली, मात्र त्यांना गावाच्या हद्दीबाहेर जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला.\nनवी मुंबई विमानतळ प्रकल्पात १० गावे विस्थापित होत आहेत. त्यांचे वडघर, दापोली, वहाळ या गावांशेजारी पुनर्वसन होणार आहे मात्र याच भागातील पारगाव, डुंगी, ओवळे, दोपोली, आणि भंगारपाडा ही गावे स्थलांतरित होणार नाहीत. या विस्थापित न होणाऱ्या गावांचीही जमीन सिडकोने संपादित केल्याने त्यांना पुनर्वसन पॅकेज देण्यात आले आहे. या प्रकल्पग्रस्तांच्या सोसायटय़ा तयार करून ५० टक्क कामे दिली जातील, असे चार वर्षांपूर्वी स्पष्ट करण्यात आले आहे, मात्र सिडकोने डुंगी गावातील चार सोसायटय़ांना कामे दिली असून पारगावला दुर्लक्षित ठेवले आहे. त्यामुळे या गावातील प्रकल्पग्रस्तांची नाराजी वाढली आहे.\nदोन बाजूंनी खाडीपात्र असलेल्या या गावात अलीकडे भरतीच्या वेळी पाण्याची पातळी वाढू लागली आहे. आजूबाजूच्या गावांत भराव टाकला जाऊ लागल्याने भरतीचे पाणी या गावाशेजारी जास्त प्रमाणात येऊ लागले आहे. त्यामुळे गावाला पुराचा धोका आहे, असा प्रकल्पग्रस्तांचा आरोप आहे. सिडकोने यासाठी एका खासगी संस्थेकडून सर्वेक्षण करून घेतले आहे, पण त्याचा अहवाल अद्याप प्रसिद्ध न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम आहे. मंगळवारी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी पारगावाच्या वेशीवर अडवले. त्यांनी मोच्र्यासाठी पोलिसांची परवानगी घेतली नव्हती. आमच्या शेतात आम्हाला उभे राहण्यास तुम्ही कशी बंदी घालू शकता, असा सवाल ग्रामस्थांनी केला. मागण्या पूर्ण न झाल्यास परिणामांची जबाबदारी सिडकोवर राहील, असे पोलीस, कंत्राटदाराला दिलेल्या निवेदनात, नमूद केले आहे.\nसोमवारी रात्री उशिरा बैठक घेऊन प्रकल्पग्रस्तांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पारगावाचा एक भाग असलेल्या कोल्ही गावात लक्ष्मी नारायण देवस्थानाचा सप्ताह असल्याने या गावातील प्रकल्पग्रस्तांनी या आंदोलनात भाग घेऊ नये, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची संख्या काही प्रमाणात कमी झाली.\nविमानतळपूर्व कामांपैकी कोणतेही काम बंद झालेले नाही. पारगाव गाभा क्षेत्रात नाही. पूरसदृश स्थिती निर्माण होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील. सीओईएफ (पुणे) अथवा आयआयटी पवईची मदत घेतली जाईल. त्यांची पुनर्वसनाची मागणी पूर्ण करण्यायोग्य नाही.\n– भूषण गगराणी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको\nठरल्याप्रमाणे सिडकोने प्रकल्पग्रस्तांना कामे वाटून देण्यासाठी मध्यस्थी करणे गरजेचे आहे. डुंगीतील चार सोसायटय़ांना कामे दिली जातात आणि पारगावाला वाळीत टाकले जाते, हे योग्य नाही. याच गावाला पुराचा संभाव्य धोका आहे पण सिडको त्यासाठी काहीच करत नाही. त्यामुळे आज आम्ही रस्त्यावरुन उतरून कामे बंद केली. सिडकोने योग्य भूमिका न घेतल्यास आंदोलन तीव्र केले जाईल.\n– सदाशिव पाटील, पंच, पारगाव समिती\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n पिंपरीत पित्याने दोन मुलांची हत्या करुन केली आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nIt's Official: नात्यावर शिक्कामोर्तब करत अखेर निक-प्रियांका म्हणाले....\nसहजीवनाचा पहिला टप्पा सर, थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा\nइम्रान खानच्या शपथविधीला सिद्धूंना मानाचे स्थान, घेतली लष्करप्रमुखांची गळाभेट\nमिनी एसयुव्हीसारखं डिझाईन असलेली नवीन रेनाँ क्विड वसूल करते तुमचा पै न पै\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nअंतर्गत वाहतुकीसाठी ट्रामचा पर्याय\nवाहनांना एक टोल माफ\nरेल्वेचे संगणकीय आरक्षण केंद्र पावणेतीन तास बंद राहणार\nस्वानंद देणारे शिक्षण निवडा\nवामनदादा कर्डकांना शाहिरीतून अभिवादन\nभूगावमधील हॉटेलमध्ये कोंबडय़ांच्या झुंजीवर जुगार\nपाणी पुरेना आणि म्हणे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%82-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-18T10:53:00Z", "digest": "sha1:7KHYEI3C4CV4PNYFKZ6OHCKMQQ4UG7IC", "length": 9648, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुनर्रचित बांबू धोरण शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुनर्रचित बांबू धोरण शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार\nडॉ. टीएसके रेड्डी यांची माहिती\nनवी दिल्ली – केंद्र शासनाच्या बांबू लागवड धोरणाच्या पुनर्रचनेमुळे महाराष्ट्रातील शेतक-यांना मोठा लाभ होणार असून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने हे धोरण पूरक ठरेल अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. टीएसके रेड्डी यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रास दिली. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय बांबू अभियान, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ आणि भारतीय हरित ऊर्जा महासंघाच्या संयुक्त विद्यमाने “बांबू क्षेत्रातील आजवरचा विकास आणि पुढील दिशा’ या विषयावरील परिषदेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. रेड्डी यांनी ही माहिती दिली.\nडॉ. रेड्डी म्हणाले, वर्ष 2018-19 साठी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये बांबू विकासासाठी 1290 कोटींची तरतूद करण्यात आली असून बांबू लागवड धोरणाची पुनर्रचना करण्यात आली आहे. या धोरणास लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अपेक्षित असून देशातील सर्व राज्यांमध्ये या धोरणाची अंमलबजावणी सुरु होणार आहे. यापार्श्वभूमीवर आज या परिषदेचे आयोजन करण्यात आले. बांबू लागवड पुनर्रचना धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाची पूर्णपणे तयारी असल्याचे डॉ. रेड्डी यांनी सांगितले.\nमहाराष्ट्रात 4 लाख 75 हजार हेक्‍टर क्षेत्रावर बांबू लागवड केली जाते, यातील 85 टक्के लागवड एकटया विदर्भात होते. बांबू मंडळाच्या माध्यमातून राज्यातील शेतक-यांच्या जमीनीवर बांबू लागवड करणे, यासाठी त्यांना आवश्‍यक बी-बियाणे, खते व योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे आदि सुविधा देण्यात येतात. बांबू लागवड ही शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास पूरक ठरेल व या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध ही होतील, असा विश्वास डॉ. रेड्डी यांनी व्यक्त केला.\nकेंद्रीय कृषी सहकार व शेतकरी कल्याण विभागाचे सचिव डॉ. एस के पटनायक यांच्या हस्ते आज सकाळी या परिषदेचे उदघाटन झाले. दिवसभर चाललेल्या या परिषदेत तीन चर्चासत्र झाले यात 25 तज्ज्ञ वक्त्‌यांनी मार्गदर्शन केले व देशभरातील 150 तज्ज्ञांनी सहभाग घेतला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसोनम कपूरला लग्नासाठी सुटी नको\nNext articleअमरनाथ गुंफेत पुन्हा गुंजणार “हर हर महादेव – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय\n“प्रत्येकाच्या मनात सद्भावना असल्यास देशात सहिष्णुता नांदेल’\nनिम्म्या कर्नाटकवर दुष्काळाचे सावट; मात्र काही भागांत पूरस्थिती\nकाश्‍मीरमधील ग्रेनेड हल्ल्यात एकाचा मृत्यूू, तिघे जखमी\nछत्तीसगडमध्ये भिंत कोसळून तीन ठार\nसात दिवस केरळमध्ये फोन कॉल आणि मोबाईल डाटा वापर विनामुल्य\nअभिनेत्रीच्या सतर्कतेतून लहान मुलांच्या तस्करीचे रॅकेट उघड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/bharbharun-jagtana-news/senior-citizens-share-stories-of-life-experiences-with-loksatta-chaturanga-part-2-1622261/", "date_download": "2018-08-18T11:11:37Z", "digest": "sha1:EYNLDLYNFNLEI46U2ISLGJRIY64ZYNMB", "length": 17342, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Senior Citizens Share Stories Of Life Experiences With Loksatta Chaturanga Part 2 | सायंपटावर उमटलेलं सप्तरंगी इंद्रधनुष्य | Loksatta", "raw_content": "\nबेशिस्त वाहनचालकांना ९१ लाखांचा दंड\nपक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा\nपुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित\nजळगावमध्ये महाजन-खडसे गटबाजीची सर्वत्र बाधा\nएमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल\nसायंपटावर उमटलेलं सप्तरंगी इंद्रधनुष्य\nसायंपटावर उमटलेलं सप्तरंगी इंद्रधनुष्य\nनोकरीतल्या अनुभवाचा, शिक्षणाचा उपयोग होईल अशी संधी मिळाली.\nसाठी उलटूनही बराच काळ लोटलाय. माझ्या पिढीतल्या स्त्रियांनी घरदार व नोकरी असा अवघड ताळमेळ यशस्वीपणे पार पाडलेला. साहजिकच, निवृत्तीनंतर मनसोक्त मजा करायची असा निश्चयच बहुतेकींनी केलेला असतो. मीही त्याला अपवाद नव्हते. तरीही माझी गोष्ट थोडीवेगळीच म्हणावी लागेल.\nमी स्वत:ला भाग्यवानच समजते कारण विशेष यातायात न करताही मी सुनियोजित आयुष्य जगू शकले. आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे सुरळीतपणे पार पडले. जून महिन्याअखेर निवृत्त होऊन मी घरी बसले तेव्हा कर्मधर्मसंयोगानं मी एकटीच होते कारण पतिदेव मुलीकडे नातीला सांभाळण्यासाठी गेलेले. दिवसभराचा वेळ घालवायचा कसा, या प्रश्नाचं उत्तर शोधू लागले अन् काही मार्ग सापडले त्यांचीच ही कहाणी.\nनोकरीतल्या अनुभवाचा, शिक्षणाचा उपयोग होईल अशी संधी मिळाली. मी एका समाजोपयोगी काम करणाऱ्या संस्थेच्या शिक्षण वर्गात इंग्रजी शिकवू लागले. संध्याकाळच्या दोन तासांची सोय झाली. हळूहळू जवळपास राहाणाऱ्या समवयस्क मत्रिणींसह मी काही उपक्रमांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. आम्ही आमच्या साहित्यविषयक आवडीनिवडी भागतील, असं वाचनालय सुरू केलं. वर्षांकाठी उच्च साहित्य दर्जा असलेली वीस-बावीस पुस्तकं विकत घ्यायची, महिन्यातून एकदा भेटून पुस्तकांची अदलाबदल करायची, एक-दोघींनी वाचलेल्या पुस्तकाचं परीक्षण वाचायचं, त्यावर चर्चा करायची असा नियम केला. लवकरच आम्ही दिवाळी अंकांचं वाचनालयही सुरू केलं. आमच्या नेहमीच्या दहा-पंधरा सदस्यांव्यतिरिक्त वीसेक स्त्रिया त्याचा आनंद घेतात. वर्षांतले तीन-चार महिने या वाचनालयाच्या निमित्तानं आमचं वाचकवर्तुळ विस्तारतं. याच काळात आम्ही मत्रिणींनी ‘स्वरसंवाद’ नावाची एक संस्था सुरू केली आणि तिच्या माध्यमातून काही सांस्कृतिक कार्यक्रम सभागृहांमधून केले. विना नफा असलेल्या या कार्यक्रमांद्वारे आम्हाला अनेक चांगले अनुभव आणि आठवणीही गाठीशी बांधल्या.\nस्वत:विषयी सांगायचं तर निवृत्तीनंतर मी माझ्या आवडत्या छंदाला जोपासण्यात यशस्वी ठरले. नोकरी चालू असतानाच मी दोन इंग्रजी पुस्तकांचे अनुवाद केले होते. त्यांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे मी निवृत्तीनंतर पंधराहून अधिक पुस्तकं मराठी भाषेत आणली, दोन पुस्तकांना पारितोषिकंही मिळाली. मग मी आणखी एक पाऊल पुढे टाकलं. संगणकाच्या साहाय्यानं मी भाषांतर करण्याचं तंत्रज्ञान आत्मसात केलं. भाषांतराचं काम तर सुलभ झालंच, शिवाय नवीन काही तरी शिकल्याचा आनंद मिळाला अन् कौतुकाची थापही पाठीवर पडली.\nअंध विद्यार्थिनींसाठी वाचक म्हणून केलेल्या कामानं आणखी एक संधी मिळाली. त्यांना उपयुक्त ठरेल असा इंग्रजी ऑडिओ शब्दकोशही आम्ही निर्माण केला. पुस्तकवाचनाच्या निमित्तानं काही मुली माझ्या घरी येत. घरापासून दूर राहून, अंधत्वावर मात करत शिकणाऱ्या मुलींनी माझ्या मनाला एक वेगळी उमेद दिली. त्यांच्या आवडीनिवडी विचारात घेऊन त्यांना काहीवेळा जेवू घालण्यात जे समाधान मला मिळालं त्याची तुलना एकाच गोष्टीशी होऊ शकते. बऱ्याच काळानं माहेरी आलेल्या लेकीची हौसमौज पुरवणं हा अनुभव मला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन गेला. माझ्या लक्षात आलं- आजूबाजूला, नात्यात, मित्रपरिवारातही माझ्यासारख्या एकटं, एकाकी आयुष्य जगणाऱ्या स्त्रिया रिकाम्या घरटय़ात राहात आहेत. हळूहळू मी हेच काम माझ्याही नकळत करू लागले. कधी एखाद्या सखी शेजारणीबरोबर कॉफीसमवेत संध्याकाळी गप्पा मारायच्या, कधी एखाद्या मत्रिणीची आवड लक्षात ठेवून तो पदार्थ करून तिला खाऊ घालायचा, तर निव्वळ श्रवणभक्ती करून एखादीला क्षणभराचा दिलासा द्यायचा..\nशारीरिक, आर्थिक अन् मानसिक स्वास्थ्य लाभलेल्या आम्ही स्त्रिया अनेकदा प्रवास करतो, भरभरून आनंद लुटतो, पण खरं सात्त्विक समाधान मिळतं ते याच चारदोन क्षणांमधून जेव्हा आम्ही एकमेकींच्या सुखदु:खात सहभागी होतो. आयुष्य जगायचं ते ‘कण्हत कण्हत नव्हे तर गाणं म्हणत’ हा पाठ स्वत: गिरवत अन् त्यांनाही बळ देत. असे प्रसंग म्हणजे सायंपटावर उमटलेलं सप्तरंगी इंद्रधनुष्यच.\n– नीला चांदोरकर, मुंबई\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n पिंपरीत पित्याने दोन मुलांची हत्या करुन केली आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nIt's Official: नात्यावर शिक्कामोर्तब करत अखेर निक-प्रियांका म्हणाले....\nसहजीवनाचा पहिला टप्पा सर, थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा\nइम्रान खानच्या शपथविधीला सिद्धूंना मानाचे स्थान, घेतली लष्करप्रमुखांची गळाभेट\nमिनी एसयुव्हीसारखं डिझाईन असलेली नवीन रेनाँ क्विड वसूल करते तुमचा पै न पै\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nअंतर्गत वाहतुकीसाठी ट्रामचा पर्याय\nवाहनांना एक टोल माफ\nरेल्वेचे संगणकीय आरक्षण केंद्र पावणेतीन तास बंद राहणार\nस्वानंद देणारे शिक्षण निवडा\nवामनदादा कर्डकांना शाहिरीतून अभिवादन\nभूगावमधील हॉटेलमध्ये कोंबडय़ांच्या झुंजीवर जुगार\nपाणी पुरेना आणि म्हणे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tarunbharat.com/news/580012", "date_download": "2018-08-18T10:25:25Z", "digest": "sha1:UJ4SRCXY7L3QC5O3UFTRDCPXY4JKCEZI", "length": 7654, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गोंयचो आवाज संघटनेने माफी मागावी, अन्यथा खटला दाखल करणार- आमदार एलिना साल्ढाना - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » गोंयचो आवाज संघटनेने माफी मागावी, अन्यथा खटला दाखल करणार- आमदार एलिना साल्ढाना\nगोंयचो आवाज संघटनेने माफी मागावी, अन्यथा खटला दाखल करणार- आमदार एलिना साल्ढाना\nकुठ्ठाळी : पत्रकार परिषदेत बोलताना आमदार एलिना साल्ढाणा.\nकासावलीतील 200 चौ. मी. जमीनीचे बेकायदेशीर रूपांतर केल्याचा आरोप कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाना यांनी फेटाळला आहे. या विषयी काल सायंकाळी त्यांनी पत्रकार घेतली व गोंयचो आवाज या संघटनेने केलेले आरोप चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. आपले नाव बदनाम करणाऱया या संघटनेने जर आपली माफी मागितली नाही तर येणाऱया 48 तासांत आपण या संघटनेवर अब्रु नुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे सांगितले.\nमडगांवच्या लोहिया मैदानावर गोंयचो आवाज या संघटनेने राजकीय नेत्यानी बेकायदेशीर भू-रूपांतर केल्याच्या आरोपात आमदार एलिना साल्ढाना यांनाही गोवण्यात आले होते. कासावलीतील ज्या जागेसंदर्भात त्यांच्यावर करण्यात आला होता, त्याविषयी त्यांनी कायदेशीर कागदपत्रांसह माहिती दिली. गोंयचो आवाज या संघटनेने आपल्यावर केलेला आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. कासावलीतील भू सर्व्हे क्र. 85/7 व 76/9 ही जागा माथानी साल्ढाणा यांच्या नावे आहे. प्रादेशीक आराखडा 2021 च्या रचनेला 2007 पासून सुरवात झाली आणि त्यावेळेस माथानी साल्ढाणा आमदार नव्हते तसेच आपलाही काही संबंध नव्हता. पुढे 2009 साली कासावली-आरोसी-कुएली पंचायतीने या आराखडय़ाबद्धल आपला विरोध दर्शवून काही सुचना मांडल्या. हा विषय सभेत मांडून पंचायतीने आपले मत नगरनियोजन मंडळाला कळविले. यावेळी माथानी साल्ढाणा कासावली गावच्या लोकांबरोबर राहिले व प्रादेशीक आराखडय़ाला विरोध दर्शविला व त्यात काही बदल करावे असे त्यांनी सुचविले होते. त्यांनी केलेल्या या विरोधात भू सर्व्हे क्र. 85/7 व 76/9 जागेत दाखविणाऱया पार्किंग तसेच दहा मीटरचा रस्ता रूंदीकरणाचाही समावेश होता. पुढे 2015 साली जेव्हा नगरनियोजन खात्याचे मंत्री फ्रान्सिस डिसोजा होते, त्यावेळी हा आराखडा मान्यतेस पुन्हा पंचायतीत आला. त्यावेळी आपणही माथानी साल्ढाणा यांनी केलेल्या सुचनावर ठाम राहून कासावली पंचायतीसोबत विरोध दर्शविला असे एलिना साल्ढाणा यांनी सांगितले.\nपत्रादेवीत मृत माकड सापडल्याने घबराट\nगणवेषधारी विद्यार्थ्याना समुद्रकिनाऱयावर प्रतिबंध करा\nतपोभूमीने रचला नवा इतिहास\nराज्य पोलीस खात्यात उपअधीक्षकांची कमतरता\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://shatadapremkarave.blogspot.com/2008/03/blog-post_21.html", "date_download": "2018-08-18T10:47:58Z", "digest": "sha1:W3HRDA54VKBBRHI4PZUGO44MWHY4ECHE", "length": 2841, "nlines": 68, "source_domain": "shatadapremkarave.blogspot.com", "title": "शतदा प्रेम करावे: बरसावं तर .............", "raw_content": "\nनमस्कार मित्रानो. मी अनिल बिहाणी . मझ्याबाबातीत सांगण्यासारखे विशेष काहिच नाहि.मी एक् सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य मुलगा आहे.पण प्रत्येक समान्यात कुठे तरि असामन्यत्व द्डलेलं असतं.माझ्यातल्या या असामान्यत्वाचा शोध् घेणे सद्या सुरु आहे.\nझूळझुळ करीत जावे कधी\nबरसावं तर अगदी असंच\nसा-यांचे चित्त सुखावून .\nअसावे हिरवळ बनून .\nजय हो तेरी गोविंदा ......\nही वाट दूर जाते .......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538819", "date_download": "2018-08-18T10:27:26Z", "digest": "sha1:4SI6F5CIWRVZZVGF7YSTTV6GZXUXPQ4R", "length": 4859, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला करणाऱया तीन्ही दहशतवाद्यांचा खात्मा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला करणाऱया तीन्ही दहशतवाद्यांचा खात्मा\nअमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला करणाऱया तीन्ही दहशतवाद्यांचा खात्मा\nऑनलाईन टीम / श्रीनगर :\nअमरनाथ यात्रेवरील यात्रेकरूंच्या बसवर हल्ला करणाऱया दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय सैन्य आणि काश्मीर पोलिसांना यश आले आहे. अमरनाथ यात्रेवर हल्ला करणाऱया सर्व दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती जम्मू काश्मीरच्या पोलिस महासंचलकांनी दिली आहे.\nयाबाबतचे ट्विट शेष पॉल वेद यांनी केले आहे. सूत्रधार अबू इस्माईलच्या खात्म्यानंतर अमरनाथ यात्रेवर हल्ल करणारे अबू माविया,फुरकान आणि यावर यांना कंठस्नान घातले,असे ट्विट वेद यांनी केले आहे.सोमवारी श्रीनगर जम्मू- हायवेवर पोलिस आणि सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा झाला. या चकमकीत एक भारतीय जवानही शाहीद झाला आहे.\nनॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून वादग्रस्त घोषणा\nबंगालमधील सांप्रदायिक तणाव कायम\n‘भारत बंद’ला हिंसक वळण ; ग्वाल्हेरमध्ये 19 जखमी,पाच जणांचा मृत्यू\nअमित शाह यांची ‘मातोश्री’भेट संभ्रमात\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/539386", "date_download": "2018-08-18T10:27:34Z", "digest": "sha1:5NEIXGFKM6M2TMZMVWBLV65AHIHGA3XF", "length": 4911, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आधार लिंकिंगची मुदत 31 मार्चपर्यंत वाढणार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » आधार लिंकिंगची मुदत 31 मार्चपर्यंत वाढणार\nआधार लिंकिंगची मुदत 31 मार्चपर्यंत वाढणार\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nशासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच बँक अकाऊंट आणि मोबाईल नंबरशी आधार लिंक करण्याची मुदत आता 31 मार्चपर्यंत वाढवण्यात येणार आहे.\nकेंद्र सरकारने सर्व कल्याणकारी योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य केलं आहे. त्यासाठी शासकीय योजना आणि बँक खात्याशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2017 पर्यंत होती. तर मोबाईल नंबर रिव्हेरिफाय करण्यासाठी 6 फेब्रुवारी 2018 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, केंद्र सरकारच्या वतीने आधार लिंकिंगची डेडलाईन वाढवण्याबाबतची अधिसूचना शुक्रवारी जारी करण्यात येणार आहे.\nआधार लिंकिंगबाबत मुदतीसाठी सुप्रीम कोर्टात विविध याचिका दाखल झाल्या आहेत. याबाबत पुढील सुनावणी पुढील आठवडय़ात होणार आहे. सुप्रीम कोर्टातील आधार अनिवार्यतेच्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारच्या वतीने हे स्पष्ट करण्यात आले.\n26/11 हल्ल्याचा पुन्हा एकदा तपास करा : भारताने पकिस्तानला ठणकावले\nगोहत्या बंदी कायदा संपूर्ण देशात लागू करावा : भागवत\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रातून भाजपला फटकारे\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%A6/", "date_download": "2018-08-18T10:54:10Z", "digest": "sha1:MBBC7QJ4CEGABA3BMOPTTLOW2P3ZCYWD", "length": 6469, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वेश्‍या व्यवसायप्रकरणी दिघीत हॉटेलवर कारवाई | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवेश्‍या व्यवसायप्रकरणी दिघीत हॉटेलवर कारवाई\nपिंपरी – वेश्‍या व्यवसाय सुरु असलेल्या दिघी येथील एका हॉटेलवर पोलिसांनी छापा मारून सात मुलींची सुटका केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 12) आळंदी-मोशी रोड डुडुळगाव येथील आमंत्रण लॉजिंग या हॉटेलवर करण्यात आली.\nविजय बबन शिवले (वय-41, रा. डुडुळगाव, आळंदी) आणि वैजनाथ नरहरी बाबर (वय-27, रा. देहूफाटा, मोशी रोड, आळंदी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल मॅनेजर वैजनाथ हा मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्‍या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करत होता. याबाबत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना पोलीस हवालदार रमेश लोहकरे यांच्याकडून माहिती मिळाली. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखेचा सामाजिक सुरक्षा विभाग आणि दिघी पोलीस यांनी संयुक्तपणे आमंत्रण लॉजिंग या हॉटेलवर छापा मारला. कारवाईत तीन हजार रुपये रोख रक्कम, दोन मोबाईल फोन आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच कारवाईत लॉजमधील 7 मुलींची सुटका करण्यात आली. त्यांना मोशी येथील चैतन्य रेस्क्‍यू होम येथे ठेवण्यात आले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअनैसर्गिक संबंधाच्या त्रासाने पत्नी घटस्फोटाची हक्कदार\nNext articleमहावितरणची यंत्रणा जुंपली कामाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune-wari/pandharpur-wari-2017-53897", "date_download": "2018-08-18T10:29:58Z", "digest": "sha1:CXACZJPBBBTT4JJVHJPK3EXJ6T55FBS3", "length": 21198, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pandharpur Wari 2017 विठ्ठलनामाने दुमदुमली पुण्यनगरी | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 20 जून 2017\nवारीला निघालेल्या वारकऱ्यांना म्हणे वयाचं, अंतराचं, दिवसदिवस पायी फिरून येणाऱ्या थकव्याचं असं काही भान नसतंच. मनात माउलींचं नाव घेतलं की तोच या सगळ्या गोष्टींना सहन करण्याचं बळ अंगी फुंकत असतो त्यांच्या... ज्याने कुणी हे म्हणून ठेवलंय ते अगदी खरंच आहे. नाहीतर, देहू- आळंदीहून पायी चालत पुण्यात रात्री साडेदहा- अकराच्या सुमारास मुक्कामी पोचलेल्या या सगळ्यांच्या अंगात दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे चारच्या ठोक्‍याला माउलींच्या दर्शनासाठी हजर राहण्याचं बळ आलं असतं तरी कुठून\nपुणे - सोमवारी पहाटे भवानी पेठेत असलेल्या ज्ञानोबा आणि नाना पेठेतील तुकोबांच्या पालख्यांच्या मुक्कामी असलेल्या या उत्साही भाविकांना पाहून \"माउली'नामातली आंतरिक शक्ती शब्दशः जाणवून आली. \"भेटी लागे जीवा, लागलेली तुझीच आस' हीच भावना आज सर्वत्र दिसत होती.\nरविवारच्या दिवशी ज्ञानेश्वर माउली आणि संत तुकोबांच्या पालख्यांचं आळंदी अन्‌ देहूहून पुण्यात मोठ्या थाटात आगमन झालं. यंदा पाऊसही वेळेवर बरसल्यामुळे अंगी अधिकचा उत्साह आणि चेहऱ्यांवर आनंद घेऊनच वारकरी बांधव पुण्यनगरीत येते झाले. याच पार्श्वभूमीवर यंदा मुक्कामाच्या दिवशीचं खास पहाटेचं वातावरण टिपावं आणि ते आपल्या वाचक- प्रेक्षकांनाही अनुभवायला द्यावं, म्हणून \"सकाळ'ने ज्ञानोबा- तुकोबांच्या पालखी मुक्कामाच्या ठिकाणी \"फेसबुक लाइव्ह' देखील केलं.\nखरं सांगायचं तर भक्ती, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, शिस्त, सहकार्य, संघभावना, विनय, समर्पण अशा अनेक गुणांचं वारकऱ्यांच्या रूपातलं प्रत्यक्ष दर्शनच यानिमित्ताने इथे घडू शकलं.\nडोळ्यांच्या कवेत सामावणार नाही अशी अलोट गर्दी आणि भाविकांच्या रांगा ज्ञानोबा- तुकोबांच्या पादुकांच्या दर्शनासाठी अनुक्रमे भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिर आणि श्री निवडुंगा विठोबा देवस्थान संस्थान या दोन्ही मंदिरांपाशी कधीच जाऊन पोचल्या होत्या. महिला आणि पुरुषांच्या स्वतंत्र रांगा, त्यात कुणीही न सांगता स्वतःहून राखली गेलेली शिस्तबद्ध रचना, भाविकांच्या सुविधेसाठी असणारे कर्मचारी आणि सुरक्षेसाठी असणारा चोख पोलिस बंदोबस्त, असं दृश्‍य दोन्ही ठिकाणी दिसत होतं.\nएकीकडे दर्शन घेणारे भावोत्कटतेने पादुकांचं अन्‌ विठुमाउलींचं दर्शन घेऊन बाहेर पडत होते, तर दुसरीकडे त्याच्या दुप्पट वेगाने दर्शनाची आस घेऊन आलेले भाविक रांगेत लागत होते. यानिमित्ताने भवानी पेठेला भल्या पहाटे आलेली उत्साही झळाळी देखील पावलोपावली जाणवून येत होती \nअर्थात, उत्साहाचं हे वातावरण आणि ही लगबग केवळ शहराच्या मध्यवर्ती भागातच होती, असं नाही. शहरात इतरत्र/ काही उपनगरांत विसाव्यास थांबलेले वारकरी आणि अनेक पुणेकर देखील पालखी सोहळ्याचं आणि पादुकांचं दर्शन घेण्यासाठी आवर्जून पालखी मुक्कामी पोचत होते. पालख्यांच्या निमित्ताने शहरच जणू आज ठरवून लवकर उठलं होतं.\nविविध रस्त्यांवरून पालख्यांपर्यंत येताना \"ज्ञानोबा- तुकोबा', \"माउली माउली', \"जय जय राम-कृष्ण-हरी', \"पुंडलिक वरदे'... असे अनेक जयघोष कान तृप्त करत होते. ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदिरांत तर श्रवणीय कीर्तनांचं पीकच फुललं होतं. गाणारा एक आणि त्यास साथ देणारे अनेक, असं इथलं दृश्‍य एक विलक्षण उत्साह अंगी जागवत होतं. विशेष म्हणजे, हे सारे जयघोषच अनेकांना \"जागते व्हा' म्हणत झोपेतून अलगद उठवतही होते...\nएकीकडे आन्हिकं आटोपून भक्तिभावाने दर्शनासाठी जाणारे भाविक जसे दिसत होते, तसंच दुसरीकडे दर्शन घेऊन परतणाऱ्यांसाठी, वारकऱ्यांसाठी अनेक समाजसेवी बांधव आणि संस्थांतर्फे न्याहारीची सोयही केली जात असल्याचं दिसून आलं. एकूणच एखाद्या आनंदयात्रेचं स्वरूप आज शहराला आल्याचं दिसून आलं.\nसहा हजार भाविकांनी अनुभवला पालखी मुक्काम \"ऑनलाइन' \n\"सकाळ'च्या फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून ज्ञानोबा- तुकोबांच्या पादुकांचं ऑनलाइन दर्शन सुमारे सहा हजार भाविकांनी पहाटे साडेपाच ते साडेसहा या वेळेत घेतलं. विशेष म्हणजे, ज्ञानोबा माउलींच्या पादुकांना केलेला अभिषेक आणि आरतीचा अनुभवही भाविकांना या वेळी \"लाइव्ह' घेता आला. पहाटे काकड आरती झाल्यावर माउली आणि तुकोबारायांच्या चांदीच्या पादुकांवर दुधाची धार धरली होती, तेव्हा ब्रह्मवृंद मंत्रोच्चारात, तर वारकरी हरिपाठाचे स्वर आळवत होते. थेट प्रक्षेपण होत असताना प्रेक्षकांकडून माउली आणि तुकोबांच्या जयजयकाराच्या \"कमेंट्‌स' येत होत्या. माउलींची साग्रसंगीत आरती सुरू असताना मंदिरातील वातावरण भक्तिभावाने भरून पावलं होतं. जयघोषाच्या सोबतीला असणारी टाळांच्या तालाची साथ भाविकांना अधिकच तल्लीन करत होती.\nहाती सेल्फी स्टिक अन्‌ मनी आस डोकं टेकवण्याची...\nज्ञानोबा- तुकोबांच्या पादुकांवर क्षणभर डोकं टेकायला मिळावं, त्यांना तेवढ्याच वेळेत डोळे भरून पाहता यावं, हात लावून नमस्कार करता यावा, यासाठी डोळेभरली आस घेऊन आलेले भाविक भल्या पहाटे पाहायला मिळत होते. अनेकजण आपल्या चिमुकल्यांसह आले होते. भक्तिरसात चिंब झालेल्या या वातावरणात सारे सारे जणू माउलीमय झाले होते. हाती टाळ घेतलेले वृद्ध वारकरी आणि त्याचवेळी हाती सेल्फी स्टिक आणि कॅमेरा घेतलेले तरुण अशा दोन्ही पिढ्यांचा अभिनव असा पारंपरिक- आधुनिक मिलाफही या वेळी दिसून आला.\nशहराच्या उपनगरीय भागांत अनेक ठिकाणी वारकऱ्यांनी आपापली विसाव्याची ठिकाणं निवडून तिथे मुक्काम केला होता. या ठिकाणाहून प्रत्येकालाच भवानी पेठेपर्यंत येणं शक्‍य नव्हतं. अर्थात, त्यामुळे त्यांच्या भक्तिसाधनेत कसलाही फरक पडल्याचं दिसलं नाही. \"जिथे मुक्काम तीच आमची पंढरी' म्हणत अनेक जणांनी आहे तिथेच हरिपाठ वाचन आणि ज्ञानोबा- तुकोबा- माउलीनामाचा गजर सुरू केल्याचं दिसून आलं. वारीने अवघी पुण्यनगरी अशी व्यापून राहिली होती.\nसंत तुकाराम महाराज पालखी\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी\nसिद्धूचे पाक लष्करप्रमुखांना अलिंगन\nनवी दिल्ली : पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला काँग्रेसचे नेते व भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांना खास आमंत्रण होते....\nपिंपरी - दोन मुलांना मारून वडिलांची आत्महत्या\nपिंपरी (पुणे) - दोन मुलांना मारून वडिलांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना शनिवारी दुपारी ताथवडे येथे घडली. शुभम बर्मन (वय १०) रूपम वर्मा (वय...\nMaratha Kranti Morcha : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री आंदोलन\nपुणे : मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे सोमवारपासून (ता.20) मराठा आरक्षणासाठी आणि विविध मागण्यांसाठी पुणे विभागीय आयुक्त...\n'एक धागा शौर्य' का सैनिकांसाठी जुन्नरच्या विद्यार्थ्यांनीचा अभिनव उपक्रम\nजुन्नर - सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांसाठी जुन्नरच्या शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थिनींनी 'एक धागा शौर्य'का हा अभिनव...\nटाकवे बुद्रुक - सावित्रींच्या लेकींना दुस-या टप्प्यात पंधरा सायकलींचे वाटप\nटाकवे बुद्रुक - आंदर मावळाच्या मिंडेवाडी तील ठाकरवस्ती, चावसरवस्ती, जाधववाडीतून पायपीट करीत येणा-या विद्यार्थ्यांसह सावित्रींच्या लेकींना दुस-या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathiinfopedia.co.in/marathi-vyakran/", "date_download": "2018-08-18T09:55:59Z", "digest": "sha1:MHKHZFXNMM6UJXNTKP2SI6C4ZLSDL5ZS", "length": 5280, "nlines": 100, "source_domain": "marathiinfopedia.co.in", "title": "मराठी व्याकरण - MARATHI INFOPEDIA Marathi Information Portal", "raw_content": "\nमराठी व्याकरण म्हणजे मराठी भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. वि + आ + (कृ(->करण) = व्याकरण. व्याकरण भाषेचा मागोवा घेते. पतंजलीने व्याकरणास ‘शब्दानुशासन’ असेही नाव दिले आहे. परस्परांचे विचार विशिष्ट पद्धतीने व्यक्त केले तर ते सुसंबद्ध, समजण्यास सुकर ठरतात. आपण जे बोलतो किंवा लिहितो ते नीटनेटके, व्यवस्थित, आकर्षक, शुद्ध ठेवण्याच्या दृष्टीने व्याकरणाची मदत घेता येते.\nवर्ण, शब्द, पद, वाक्य, भाषा, व्यवहारातील सुयोग्य उपयोग, इत्यादींचा अभ्यास व्याकरण करते.\nमराठी भाषेच्या व्याकरणाचे भारतीय आर्य भाषागटाशी बरेचसे साम्य आहे\nधडा (भेट द्या Chapter)\nक्रियाविशेषण अव्यय भेट द्या\nशब्दयोगी अव्यय भेट द्या\nउभयान्वयी अव्यय भेट द्या\nकेवल प्रयोगी अव्यय भेट द्या\nलिंग विचार भेट द्या\nक्रियापदाचे काळ भेट द्या\nवाक्यसंश्लेषण (वाक्यसंकलन) भेट द्या\nवाक्यरुपांतर (वाक्यपरिवर्तन) भेट द्या\nमिश्र वाक्यात येणाऱ्या गौण वाक्याचे प्रकार भेट द्या\nपदपरिस्फोट/व्याकरण चालवणे भेट द्या\nशुद्धलेखनाचे नियम भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z90626014221/view", "date_download": "2018-08-18T09:58:00Z", "digest": "sha1:TEAJBM7V2RSFH46DFUCJEFNUTQDQIWQG", "length": 21300, "nlines": 168, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय १२", "raw_content": "\nहिंदू धर्मियांत विधवा स्त्रिया कुंकू का लावत नाहीत\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|स्वामी समर्थ सारामृत|\nश्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय १२\nस्वामी समर्थांचा आशीर्वाद \"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.\"\nश्री गणेशाय नमः ॥ करावया जगदुद्धार हरावया भूभार नाना अवतार धरीतसे ॥१॥\n तेची समर्थ श्रीस्वामी ॥२॥\n आनंद पोटी नच मावे ॥३॥\nत्या दिवशी श्री समर्थ होते खासबागेत गर्दी झाली श्रीजवळी ॥४॥\n तेव्हा चिंता पडली ऐशी ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल ॥५॥\n आज करु नये भोजन बाळाप्पाचे तनमन \n स्वामी सान्निध पातले ॥७॥\n दृढ चरण धरियेले ॥८॥\n परम तोषला मानसी ॥९॥\n तैसे बाळाप्पा ते अवसरी स्वामीचरणी दृढ झाले ॥१०॥\n कमलपुष्प न सोडी सहसा स्वामीचरणी बाळाप्पा तैसा दृढ जडला स्वभावे ॥११॥\n ब्रह्मानंद न मावे पोटी स्तोत्र ओठी गातसे ॥१२॥\nश्री स्वामी समर्थ त्या वेळी पडले होते भूतळी लीला एक विचित्र ॥१३॥\n ऐशा कृतीने दाविले ॥१४॥\n चित्त गुंतले अखंड ॥१५॥\n म्हणती जाऊ दर्शना ॥१६॥\n बाळाप्पा हाती दीधला ॥१७॥\n बाळाप्पा तेव्हा चालले ॥१८॥\n मग करु प्रसाद भक्षण मार्गी तयांसी वर्तमान विदीत एक जाहले ॥१९॥\nया समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात प्रवेश कोणाचा न होय ॥२०॥\n बाळाप्पा मनी झाले खिन्न म्हणती आज नैवेद्यार्पण आपुल्या हस्ते नोहेची ॥२१॥\n मग सारिले भोजन ॥२२॥\nनित्य प्रातः काळी उठोन षटकर्माते आचरोन \nश्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य त्याचे करावे पूजन नित्य माध्यान्ही येता आदित्य \n त्याने पोट भरावे ॥२६॥\n मुख्य होती त्या वेळी ॥२८॥\n आधिपत्य सर्व असे ॥२९॥\n बाई आज्ञा करी ऐशी आपणही श्रीसेवेसी करीत जावे आनंदे ॥३०॥\n म्हणे सुदिन आज उगवला सदगुरुसेवेचा लाभ झाला जाहले सार्थक जन्मांचे ॥३१॥\n सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै ॥३२॥\nमी प्रिय बहू स्वामींसी ऐसा अभिमान तियेसी तुच्छ मानू लागली ॥३३॥\n एकचित्त सर्व केले ॥३५॥\n बाळाप्पा सिद्ध ठेविती ॥३६॥\n परी तेथेही पूजा आरती नियमे करिती बाळाप्पा ॥३७॥\n दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करिती आनंदे ॥३८॥\nऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाचिया शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी ॥३९॥\n तया दुःखे विव्हळ होत म्हणती कैसे करावे ॥४०॥\nभोग भोगिला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पहाता उकलोन विष त्यात निघाले ॥४१॥\n पडले आज बाहेर ॥४२॥\n गुप्त राहिले होते उदरी सदगुरुसेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे ॥४३॥\n स्वामीमय न जाहले ॥४४॥\nहे पाहोनी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी \n एके दिनी समर्थ करिती परी बाळाप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना ॥४७॥\n समर्थ दिली आज्ञा जाण हे नसेल सत्य पूर्ण हे नसेल सत्य पूर्ण विनोद केला निश्चये ॥४८॥\n न करावी हेचि सत्य यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा ॥४९॥\nतेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली \n नेत असे सत्वर ॥५३॥\n नुकसान होते आपुले ॥५४॥\n केले पाहिजे युक्तीने ॥५५॥\n आपण येथे राहिला ॥५६॥\n बाळाप्पा मनी खिन्न झाला ॥५७॥\n व्यर्थ माझा जन्म हा ॥५८॥\nस्वामीनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी मी जातो आपुल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच ॥५९॥\n जावया इच्छी बाळाप्पा ॥६०॥\n बाळाप्पा येथे करीतसे ॥६१॥\n कापट्य मनी आणिले ॥६३॥\n समर्थ न देती आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा घ्यावी आपण ॥६४॥\nतयांचे कपट न जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी अवश्य म्हणे त्याच दिनी दोन चिठ्ठ्या लिहोनी \n करी ऐसे लिहिलेसे ॥६६॥\nभटजी मनी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला न सोडितील निश्चये ॥६७॥\nस्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती करितील यति दयाळ ॥६८॥\n तयांसी शरण सदैव ॥६९॥\n नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत द्वादशोऽध्याय गोड हा ॥७०॥\nश्रीराजाधिराज योगीराज श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु ॥\nवि. आळ घेणारा ; तोहमत्या . कुंभाडखोर . ' नामदेवासी बोलिला काय गातोसी काय कुफराणा ' - भावि १० . १७६ . ( कुफ्राण )\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kutumbkatta-news/tour-hampi-hampi-city-1628839/", "date_download": "2018-08-18T11:09:04Z", "digest": "sha1:SYXD6EGOMXIHBPXL5EDN472FJDDWYB5C", "length": 19394, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "tour Hampi Hampi City | हम्पीच्या तटावर, हिप्पींच्या बेटावर.. | Loksatta", "raw_content": "\nबेशिस्त वाहनचालकांना ९१ लाखांचा दंड\nपक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा\nपुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित\nजळगावमध्ये महाजन-खडसे गटबाजीची सर्वत्र बाधा\nएमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल\nहम्पीच्या तटावर, हिप्पींच्या बेटावर..\nहम्पीच्या तटावर, हिप्पींच्या बेटावर..\nकर्नाटकात असणाऱ्या हम्पीला मुंबई किंवा पुण्याहून सहज जाता येतं.\nरामायणातील सुग्रीव-हनुमानाची किष्किंधा नगरी ‘पंपाक्षेत्र’ म्हणून प्रसिद्ध होती. त्याचंच अपभ्रंश होऊन हम्पी हे नाव रूढ झालं. ते चौदाव्या शतकातल्या भव्य विजयनगर साम्राज्याचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं केंद्र बनलं. अल्लाउद्दीन खिल्जीचा दक्षिणेतल्या अनेगुंदीचा राज्यकारभार सांभाळणाऱ्या हरिहर आणि बुक्क या संगमपुत्रांनी हिंदू धर्म स्वीकारला आणि तुंगभद्रेच्या काठावर स्वतंत्र राज्य स्थापन केलं. पुरातत्त्व अवशेषांनी समृद्ध असलेलं ऐतिहासिक साम्राज्य, प्रभू रामाचं पौराणिक तीर्थक्षेत्र, तेनालीरामाच्या चातुर्यकथांचं आगर आणि गोव्यासारखं मोकळढाकळं वातावरण असलेलं शहर अशा विविध रूपांत हम्पी आपल्याला दिसतं.\nकर्नाटकात असणाऱ्या हम्पीला मुंबई किंवा पुण्याहून सहज जाता येतं. बंगळूरु किंवा मंगळूरला विमानाने जाऊन तिथून हम्पीला जाता येतं. ट्रेनचा पर्याय वेळकाढू आहे. बजेट आणि वेळ या दोन्ही निकषांवरचा चांगला पर्याय म्हणजे ट्रॅव्हल्सच्या बस. या बसने १२ ते १४ तासांत आपण थेट हॉस्पेटला पोहोचतो. हॉस्पेट हे हम्पीलगतचं मोठं शहर आहे. हॉस्पेटहून रिक्षा, टॅक्सी किंवा बसने काही मिनिटांत आपण हम्पीला पोहोचतो.\nआज हम्पीला दोन हजारांहूनही जास्त दगडी मंडप, भव्य मंदिरं आणि अगणित शिल्पांचा खजिना पाहायला मिळतो. लयबद्ध पायऱ्यांच्या पुष्करिणी, वैभवशाली साम्राज्याचा वारसा सांगणारे राजप्रासाद, पुरातन बाजारपेठा स्तिमित करतात. नेत्रदीपक पाषाणरथाचं विजय विठ्ठल मंदिर आणि त्याचं विस्तृत प्रांगण, भैरप्पांच्या वादग्रस्त ‘आवरण’ पुस्तकात वर्णन केलेली भग्न उग्रनृसिंह मूर्ती पाहून मन भरून येतं. रामकथा सांगणारी प्रस्तरशिल्पं, असंख्य शिवलिंग कोरलेले ‘कोटिलिंग’ यांसारखी स्थापत्यशैलीची अनेक आश्चर्ये दृष्टीस पडतात. ताला-सुरात वाजणारे कल्यामंडपातील दगडी खांब, विरुपाक्ष मंदिराच्या गोपुराची आत एका कोपऱ्यात दिसणारी उलटी प्रतिमा, सहा विविध शिल्पमुद्रा दर्शवणारं छोटंसं शिल्प यांसारखी अनेक वैशिष्टय़ं आपल्याला चकित करतात. तुंगभद्रेच्या काठावर असणारं हम्पी म्हणजे इतिहास, स्थापत्याची आवड असणाऱ्यांची पंढरीच जवळच रामभक्त शबरीचं पंपा सरोवर, हनुमानाचं जन्मस्थान मानला जाणारा अंजनाद्रि ही तीर्थक्षेत्रंही आहेत.\nइतिहासाच्या घाटावर आपल्या भौगोलिक वैशिष्टय़ांसह उभ्या असणाऱ्या हम्पीच्या पलीकडच्या घाटावर मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळतं. अनेगुंदीचाच एक भाग असणारं हे पलीकडच्या काठावरचं विरूप गड्डे गाव आता ‘हिप्पी आयलंड’ म्हणून ओळखलं जातं. ही जागा परदेशी पर्यटकांचं घरच बनलं आहे. या गावात महिनोन् महिने मुक्काम ठोकून असलेले हिप्पी इथल्या विविध कॅफेमध्ये सदैव पडीक असतात. संध्याकाळी कॉफी, मद्य किंवा हुक्का यांचा आस्वाद घेत काँगो किंवा तत्सम वाद्यांवर आफ्रिकन संगीत वाजवत शेकोटीभोवती फेर धरणाऱ्या हिप्पींनी हम्पीच्या पारंपरिक रूपाला वेगळाच आयाम मिळवून दिला आहे. अंगावरचे टॅटू आणि केसांच्या जटा मिरवत रॉयल एन्फील्डवरून भटकणाऱ्या हिप्पींमुळे हम्पीच्या या भागात मिनी-गोव्याचा ‘फील’ येतो. पावसाळ्यानंतरचा काळ हम्पीत फिरण्यासाठी सर्वोत्तम असतो. उन्हाळ्यात तीव्र ऊन, झाडांची कमतरता आणि कोरडय़ाठाक पुष्करिणी फिरण्याच्या उत्साहाला ग्रहण लावू शकतात. पूर्ण हम्पी पालथं घालण्यासाठी साधारण तीन दिवस पुरेसे आहेत. हम्पीमध्ये फिरण्यासाठी रिक्षा/टॅक्सी उपलब्ध आहेत. सायकलचा पर्याय उत्तम. गाइड्सच्या मदतीने हम्पी पाहण्यापेक्षा लोकल स्टॉल्सवर मिळणाऱ्या पुस्तकांच्या मदतीने हम्पीचा इतिहास जाणून घेणं जास्त किफायतशीर आहे. राहण्यासाठी ‘होम स्टे’चा पर्याय सर्वात चांगला आहे. मात्र हिप्पी आयलंडला राहायची इच्छा असेल, तर तिथे मोठी रिसॉर्ट्सही आहेत.\nहम्पी ते हिप्पी आयलंड प्रवासासाठी बोटीची सोय आहे. मात्र संध्याकाळी साडेपाचला शेवटची फेरी असल्यामुळे तिची वेळ सांभाळूनच फिरणं योग्य. टोपलीवजा बोटीतून प्रवास करणं हादेखील हम्पीमधला एक अविस्मरणीय अनुभव असतो.\nथोडक्यात पुरातत्त्व अवशेषांनी समृद्ध असलेलं ऐतिहासिक साम्राज्य, प्रभू रामाचं पौराणिक तीर्थक्षेत्र, तेनालीरामाच्या चातुर्यकथा अनुभवलेलं लोककथांचं आगर आणि गोव्याचा मोकळाढाकळा ूं१स्र्ी ्िरीे फील देणारं शहर अशा विविध स्वरूपात हम्पी आपल्याला दिसतं आणि विजयनगराचा अवाका समजून घेणं किती रोमहर्षक आहे, याची जाणीव करून देतं.\nहम्पीला परदेशी पर्यटकांची वर्दळ वाढल्यामुळे इथल्या हॉटेलांमध्ये इस्रायली, रशियन, कॉन्टिनेन्टल खाद्यपदार्थ मिळतात. इडली, मेदूवडा, नारळपाणी या स्थानिक पदार्थाची चव घेतली नाही तरी चालेल, मात्र ‘बनाना फ्लॉवर करी’ ही केळ्याची ‘तिखट-गोड ग्रेव्ही’ मात्र खाऊन पाहायलाच हवी.\nतंत्रा स्टाइलचे कुर्ते, धोती पॅण्ट्स, अ‍ॅक्सेसरीज, आकर्षक ज्वेलरी, टॅटू पार्लर्स तुम्हाला खिसा रिकामी करण्यास भाग पाडू शकतात. ‘बनाना फायबर्स’पासून बनवलेले कपडे इथलं वैशिष्टय़ म्हणून खरेदी करू शकता. मात्र घासाघीस करण्याचं कौशल्य पणाला लावायला हवं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nइम्रान खानच्या शपथविधीला सिद्धूंना मानाचे स्थान, घेतली लष्करप्रमुखांची गळाभेट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसहजीवनाचा पहिला टप्पा सर, थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा\n पिंपरीत पित्याने दोन मुलांची हत्या करुन केली आत्महत्या\nIt's Official: नात्यावर शिक्कामोर्तब करत अखेर निक-प्रियांका म्हणाले....\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nअंतर्गत वाहतुकीसाठी ट्रामचा पर्याय\nवाहनांना एक टोल माफ\nरेल्वेचे संगणकीय आरक्षण केंद्र पावणेतीन तास बंद राहणार\nस्वानंद देणारे शिक्षण निवडा\nवामनदादा कर्डकांना शाहिरीतून अभिवादन\nभूगावमधील हॉटेलमध्ये कोंबडय़ांच्या झुंजीवर जुगार\nपाणी पुरेना आणि म्हणे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-protests-against-mahalaxmi-temple-poojari-53473", "date_download": "2018-08-18T10:51:50Z", "digest": "sha1:KUZJ4W3FW4KN2WEODXKXGAPL2KULSERJ", "length": 11389, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news protests against mahalaxmi temple poojari आता एकच मागणी : हटाव पुजारी; कोल्हापुरात आंदोलन | eSakal", "raw_content": "\nआता एकच मागणी : हटाव पुजारी; कोल्हापुरात आंदोलन\nरविवार, 18 जून 2017\nमहालक्ष्मी मंदिर श्रीपूजकांविरोधात आंदोलन\nकोल्हापूर : श्री महालक्ष्मी मूर्तीची हेळसांड करणाऱ्या आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा अवमान करणाऱ्या श्रीपूजकांना मंदिरातून हटवा, या मागणीसाठी आज शिवसेनेसह विविध पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी श्री महालक्ष्मीला साकडे घातले. 'अंबाबाईच्या नावानं चांगभलं', 'अंबा माता की जय', 'आता एकच मागणी- हटाव पुजारी' अशा घोषणांनी सुमारे तासभर मंदिर परिसर दणाणून गेला.\nश्री महालक्ष्मीस घागरा-चोली परिधान करून पूजा बांधल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या असल्याच्या भूमिकेतून गेली अकरा दिवस विविध पक्ष, संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. त्याला श्री अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्रीपूजकांनी प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून उत्तरेही दिली. मात्र, श्रीपूजकांनी गुन्हा नोंद झाल्याने आंदोलनकर्त्यांच्या समन्वय बैठकीच्या मागणीला नकार दिला.\nत्यामुळे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय काल झालेल्या संयुक्त बैठकीत झाला. त्याचा पहिला टप्पा म्हणून आज श्री महालक्ष्मीला साकडे आंदोलन झाले. जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अद्यापही याबाबत कोणतीच ठोस भूमिका घेतली नसल्याबद्दल यावेळी तीव्र भावना व्यक्त झाल्या. याबाबत बुधवारी (ता. 21) जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा निर्णय झाला.\nKerala Floods : केरळमध्ये मदतीसाठी 38 हेलिकॉप्टर, शेकडो बोटी\nकोची : केरळमध्ये यंदाच्या शतकातील सर्वांत मोठी पूर आला असून, पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी तब्बल 38 हेलिकॉप्टर आणि शेकडो बोटी कार्यरत आहेत...\nएमआयएम नगरसेवक मतीन यांना अटक\nऔरंगाबाद- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला नकार देणारे औरंगाबादमधील एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना आज अटक करण्यात...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nवाहून गेलेला तरुण तीस तासांनंतरही सापडेना\nजळगाव ः येथील अयोध्यानगराजवळील नाल्याला काल झालेल्या पावसामुळे पूर आला होता. या पुरात इतर नागरिकांना मदत करणारा तरुण पाय घसरून नाल्यात पडून वाहून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9B%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2018-08-18T10:53:25Z", "digest": "sha1:G2HV6A3OCYE62YPOBLDWNKI2GPGE54G3", "length": 7178, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "या’ छोट्याशा देशाने केली अमेरिकेची कानउघाडणी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nया’ छोट्याशा देशाने केली अमेरिकेची कानउघाडणी\nन्यूयॉर्क : ‘अमेरिका स्वतःला जगातील सर्वात शक्तीशाली देश समजत आहे. पण, अमेरिकेने आंतरराष्ट्रीय कायद्यांचा मान राखावा व स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजू नये, अशा शब्दात बोलिव्हिया या छोट्याशा देशाने अमेरिकेची कानउघडणी केली आहे.\nबोलिव्हियाचे संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत साचा लोरेंटी यांनी अमेरिकेची कानउघडणी केली असून अमेरिकेने सिरीयावर हल्ला करण्यासंबंधी केलेल्या वक्तव्याचा देखील त्यांनी यावेळी समाचार घेतला.\nरशियातील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी अमेरिका स्वतःला सर्वात शक्तिशाली देश समजत आहे, अशी टीका केली. तसेच अमेरिकाने हे ध्यानात घ्यायला हवे कि, सिरीया संबंधी संयुक्त राष्ट्रांनी मिळून काही नियम आणि कायदे तयार केले आहेत. त्यामुळे सिरीयावर हल्ला करणे म्हणजे एक प्रकारे संपूर्ण संयुक्त राष्ट्रांच्या मर्यादांचे आणि कायद्यांचे उलंघन करण्यासारखे आहे, असे लोरेंटी यांनी म्हटले. याचबरोबर अमेरिकेने सिरीययावर हल्ला करण्याची आपली योजना मागे घ्यावी, असे त्यांनी म्हटले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleयशवंत नगरमध्ये मोफत नेत्र चिकित्सा\nNext articleशिक्षकांनों आता ‘समग्र’ डेटा एन्ट्री ऑपरेटर व्हा\nसंयुक्त राष्ट्र संघाचे माजी सचीव कोफी अन्नान यांचे निधन\nपाक व्याप्त कश्मीरच्या राष्ट्रपतींच्या शेजारी बसले सिध्दू, होतोय मोठा वाद\nइस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांची पुन्हा चौकशी\nचीन करु शकतो अमेरिकी तळांवर हवाई हल्ला\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान यांची निवड…\nसदिच्छा दूत म्हणून पाकिस्तानला भेट…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/panasonic-lumix-dmc-fp3-digital-camera-black-price-p2rZy.html", "date_download": "2018-08-18T10:22:07Z", "digest": "sha1:B7E5M5NH4732MOY26SPDENZOYKOUU56G", "length": 16216, "nlines": 404, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पॅनासॉनिक लुमिक्स दमच फप३ डिजिटल कॅमेरा Black सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फप३ डिजिटल कॅमेरा\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फप३ डिजिटल कॅमेरा Black\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फप३ डिजिटल कॅमेरा Black\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फप३ डिजिटल कॅमेरा Black\nवरील टेबल मध्ये पॅनासॉनिक लुमिक्स दमच फप३ डिजिटल कॅमेरा Black किंमत ## आहे.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फप३ डिजिटल कॅमेरा Black नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फप३ डिजिटल कॅमेरा Black दर नियमितपणे बदलते. कृपया पॅनासॉनिक लुमिक्स दमच फप३ डिजिटल कॅमेरा Black नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फप३ डिजिटल कॅमेरा Black - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फप३ डिजिटल कॅमेरा Black वैशिष्ट्य\nकाँटिनूपूस शॉट्स Max 5 images\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nसेन्सर सिझे 1/2.33 Inches\nरेड इये रेडुकशन Yes\nफासे डिटेक्टिव Yes; Photo\nएक्सपोसुरे कॉम्पेनसशन Program, Compensation\nडिस्प्ले तुपे Touchscreen LCD\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230000 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 640 x 480 pixels (VGA)\nविडिओ फॉरमॅट Motion JPEG\nमेमरी कार्ड तुपे microSD\nइनबिल्ट मेमरी 40 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फप३ डिजिटल कॅमेरा Black\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://traynews.com/mr/news/canadas-first-blockchain-etf-approved-regulators/", "date_download": "2018-08-18T10:30:45Z", "digest": "sha1:SVW2OA7LNGAX6NGDXDA7RPQPRHEKHHHM", "length": 7239, "nlines": 63, "source_domain": "traynews.com", "title": "Canada's first Blockchain ETF approved by regulators - Blockchain बातम्या", "raw_content": "\nफेब्रुवारी 3, 2018 प्रशासन\nकॅनडा पहिल्या Blockchain ईटीएफ रेग्युलेटर मंजूर\nऑन्टारियो सिक्युरिटीज आयोगाने कॅनडा पहिल्या blockchain एक्स्चेंज ट्रेडेड फंड मान्यता दिली आहे (ईटीएफ), पुढील आठवड्यात टोरोंटो स्टॉक एक्सचेंज वर लाँच करण्यासाठी सेट आहे.\nकापणी पोर्टफोलिओ, स्वतंत्र कॅनेडियन गुंतवणूक व्यवस्थापन कंपनी, जानेवारी मध्ये त्याच्या Blockchain तंत्रज्ञान ईटीएफ साठी प्राथमिक विभागांत दाखल, blockchain तंत्रज्ञान क्षेत्रातील मध्ये खरेदी संधी कॅनेडियन गुंतवणूकदारांना प्रदान करण्यासाठी प्रयत्न, ग्लोब आणि मेल त्यानुसार.\nफंड गुंतवणूक करणार “जारीकर्ता इक्विटी सिक्युरिटीज उघड, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष विकास आणि blockchain अंमलबजावणी व वितरण खातेवही तंत्रज्ञान,” एक कापणी पोर्टफोलिओ निवेदनात म्हटले आहे. कंपनी तंत्रज्ञान प्रकल्प blockchain ट्रॅक ईटीएफ साठी इच्छिते, त्याच्या कापणी Blockchain तंत्रज्ञान निर्देशांक मिरर.\nग्लोब आणि मेल मते, इतर दोन कॅनेडियन कंपन्या, प्रथम ट्रस्ट पोर्टफोलिओ कॅनडा आणि विकसित निधी गट इन्क, देखील blockchain निधी सुरू शोधत आहेत, आणि या आठवड्यात रेग्युलेटर त्यांचे प्रथम माहहतीपुणस्तकेत दाखल.\nविकिपीडिया स्वीकारणे आयर्लंड मध्ये मोठ्या homebuilder\nन्यू यॉर्क शहर योजना ...\nमागील पोस्ट:डबल डिजिट नुकसान स्वीप क्रिप्टो मालमत्ता बाजार\nपुढील पोस्ट:नवीन प्रोटोकॉल बनावट विजा नेटवर्क स्पर्धा करणार\nजुलै 17, 2018 प्रशासन\nUnboxed नेटवर्क काय आहे\nवाचन सुरू ठेवा »\nजून 19, 2018 प्रशासन\nकाम विकिपीडिया प्रकाशन: करून विकेंद्रित इलेक्ट्रॉनिक आर्थिक प्रणाली\nवाचन सुरू ठेवा »\naltcoins विकिपीडिया ब्लॉक साखळी BTC मेघ खाण काय विचार नाणे Coinbase गुप्त cryptocurrencies cryptocurrency ethereum विनिमय hardfork ICO litecoin आई खाण कामगार खाण नेटवर्क नवीन बातम्या प्लॅटफॉर्म प्रोटोकॉल उमटवणे त्यानंतर तार टोकन टोकन ट्रेडिंग पाकीट\nद्वारा समर्थित वर्डप्रेस आणि वेलिंग्टन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://marathiinfopedia.co.in/2018/07/", "date_download": "2018-08-18T09:56:22Z", "digest": "sha1:D7TLH2EOP7PB4VJ42EOJHPXC4CLBIXVH", "length": 29186, "nlines": 125, "source_domain": "marathiinfopedia.co.in", "title": "July 2018 - MARATHI INFOPEDIA", "raw_content": "\nभारतात, ‘राष्ट्रीय साक्षरता मिशनच्या’ अनुसार जर एखादी व्यक्ती आपले नाव लिहु आणि वाचु शकत असेल तर त्या व्यक्तीला साक्षर समजले जाते. वास्तवीक १९८८ मध्ये ‘राष्ट्रीय साक्षरता मिशनची’ सुरुवात झाली होती ती यासाठी की १५ ते ५५ वयोगटातील ७५% लोकांना २००७ पर्यंत कामापुरते साक्षर बनवण्यात यावे आणि त्यायोगे वेळोवेळी केल्या गेलेल्या जनगणनेत साक्षर लोकांची टक्केवारी सुध्दा वाढली. पण आजच्या जगात केवळ एवढ्याच ज्ञानावर एखादी व्यक्ती साक्षर संबोधणे चुकीचे आहे.\nपुर्वीच्या काळी निरक्षर लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणुक होतं होती. मुख्यतः सावकारांकडुन. अश्या लोकांच्या निरक्षरतेचा फायदा घेउन त्यांच्याकडुन अंगठ्यांचे ठसे घेउन मोठ्याप्रमाणात जमीनी, आर्थीक मालमत्ता लाटण्यात आल्या. पुढे सरकारकडुन सावकारांवर बंधंन आली आणि अश्याप्रकारांना आळा बसला. असे असले तरी निरक्षरतेमुळे अश्या समाजाची वाढच खुंटल्यासारखे झाले. व्यवहारी जगात प्रगतीचे अनेक मार्ग उघडे असतानाही असा निरक्षर समाज पारंपारीक व्यवहारांमध्येच गुंतुन पडला त्यामुळे त्यांचे आर्थीक प्रगतीचे मार्ग खुंटले. बालमजुरी, अल्पवयीन गुन्हेगारी, रस्त्यांवर भिक-मागणारे अनेक लहान-लहान मुले यांच्या प्रमाणात निरक्षरतेमुळे वाढ झाली. “एक स्त्री शिकली तर अख्खं कुटुंब शिकतं, सुशिक्षित होतं.” असे ज्योतीबा फुले म्हणाले होते. परंतु काळाच्या ओघात त्यांचे विचारही तितकेसे तग धरु शकले नाहीत. आजही निरक्षरतेमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. निरक्षर पालकांमुळे कुटुंब कल्याण, वाढती लोकसंख्या, बेरोजगारी, अंधश्रध्दा अश्या अनेक गोष्टी वाढत जातात ज्या इतर समाजाच्या प्रगतीच्या आड येत आहेत. महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारत देश्याच्या शक्तीला पोखरुन काढत आहेत.\nलहान मुलांच्या अंगी प्रचंड चैतंन्य असते. त्याला साक्षरतेने योग्य आकार दिला तर हीच मुले पुढे स्वतःचे आणि पर्यायाने देश्याचे भवित्यव्य उज्वल करतील. ‘शेतकर्य़ांच्या आत्महत्या’ चर्चेचा विषय ठरत असतानाच, एखादा शिकलेला साक्षर शेतकरी आपल्या हुशारीचा, ज्ञानाचा वापर करुन पर्यायी मार्ग शोधुन काढतो आणि स्वतःच्या पायावर भक्कम उभा राहीलेला दिसुन येतो. एखादे शिकलेले कुटुंब आपल्या आजारी पाल्याला अंधश्रध्देच्या आहारी जाऊन एखाद्या भोंदु-बाबाकडे न न्हेता गावातील डॉक्टरांकडे घेउन जाते आणि वेळीच औषधं मिळाल्याने त्याचा जिव वाचवताना दिसते. वर्षानुवर्ष दारीद्रात अडकलेल्या कुटुंबातील एखादी मुलगी शिकुन मोठेपणी स्वबळावर उभी रहातेच, परंतु पर्यायाने तिचे कुटुंबही दारीद्रातुन बाहेर पडते. असे एक ना अनेक उदाहरणं आपल्या आजुबाजुला घडताना पहातो. हे सर्व साकार होते ते केवळ आणि केवळ साक्षरतेमुळेच.\nआज सरकारने केवळ मुलांसाठीच नाही तर महिला आणि जेष्ठांसाठीही साक्षरता मोहीम हाती घेतली आहे. गावोगावी शाळा उभ्या रहात आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी फि-माफीच्या योजन्या राबवल्या जात आहेत. घरची परिस्थीती बेताची असल्याने दिवसभर कष्ट करुन शिकणासाठी रात्रीच्या शाळासुध्दा सुरु केल्या आहेत,\nअसं म्हणतात “वाचाल तर वाचाल”. निरक्षरता दुर करण्याची जबाबदारी फक्त सरकारचीच नाही तर तुमच्या आमच्यासारख्या साक्षरांची सुध्दा आहे. सरकारने ह्या साक्षरतेच्या अभियानात एक पाऊल पुढे टाकले आहे, निरक्षर समाजाने दोन पावलं पुढे टाकण्याची गरज आहेच, पण त्याचबरोबर गरज आहे ती आपल्या सारख्यांनी आजुबाजुला वावरणाऱ्या निरक्षर समाजाला साक्षरतेचे महत्व पटवुन देण्याची, त्यांना साक्षर बनवण्याची. निरक्षरता हा राज्यांच्या प्रगतीतील अडथळा असून तो दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. केंद सरकारने सर्वांसाठी शिक्षणाचा कायदा केला आहे. त्याची काटेकोर अमलबजावणी करून भविष्यात राज्याला शंभर टक्के साक्षर करू अशी शपथ घेऊ.\nमाझा शाळेतिल पहिला दिवस\nकिती रम्य ते दिवस, शाळेचा पहिला दिवस आजही जसाच्या तसा आठवतोय. त्या वेळी शाळा म्हणजे के. जि. वगेरे काही प्रकार नव्हते, ५ वर्षांचा होतो बाबांच्या स्कुटर वर समोर उभा रहुन पोस्ट ऑफीस जवळ्च्या ११ नंबर शाळेत पोहोचलो. सकाळचे १० वाजले होते. बाबा मला सरळ हेडमास्तरांच्या जवळ घेउन गेले.\nकाळणे गुरूजी. वयाचे ४८ वर्ष पार केलेला चेहरा, त्वचा रापलेली, डोक्यावर कमि झालेले पांढरे केस. आणी चेहर्यावर तेच प्रसन्न हास्य जे की मी पुढचे ४ वर्ष पाहणार होतो. बाबा त्यांच्यशी काहीतरी बोलत होते, पण मी तर नविनच विश्वात होतो. किती वेगवेगळ्या तसबीरी भिंतीवर लावलेल्या होत्या. हा त्यातल्या दोन-तिन गृहस्तांना मि ओळखत होतो, पण मला एक फोटो आजही आठवतो एका म्हातर्या माणसाला एक छोटा मुलगा त्यांचे काठी धरुन ओढत चालला आहे, मला समजतच नव्हत की हे नक्की चालले कुठे बरेच दिवस मि संभ्रमात होतो. शेवटी ४थ्या वर्गात हींमत करुन विचारलं होतं मी लांडे गुरूजींना, मग मात्र त्यांनी मला आधी हाताचा ’चमत्कार’ दाखवला आणी नंतर माझ्या जी. के. मधे भर पाडली.. हा तर मी पहील्या दिवशी जेव्हा हे फोटो बघण्यात दंग होतो त्यावेळीच माझा शाळेत दाखला झाला होता. मी मनात विचार केला “काय राव मला वाटलं अंतराळातुन काही लोक येतिल आणी माझा सत्कार करतिल मग मला काही खायला देतिल आणी मग माझा दाखला होईल” पण असं काहीच घडलं नाही. मी भानावर आलो तो काळणे गुरूजींच्या आवाजानेच. बर्याच वेळचे ते काहीतरी विचारत होते पण मी तर माझ्या छोट्याश्या भाववीश्वात खोल कुठेतरी भरकटत होतो.\nदाखल्याचे सर्व सोपस्कार संपउन आम्हाला काळणे गुरूजींनी वर्गाकडे नेले, तिहे मझ्याच वयचे खुप मुलं बसलेली होती पण त्याच वेळी माझ्या काळजात धस्सं झालं. बाकी कुणाला दिसो की ना दिसो मला त्या सगळ्यांच्या डोळ्यात एकच भाव दिसला, “बाबा आम्ही फसलोय तु नको फसु. जीतक लवकर होईल तितकं लवकर ईथुन पळुन जा. कारण ही समोर बसलेली बाई, जसं माहाभारतात दाखवतात तशी एका सूंदर बाईच्या वेषार एक राक्षसीण आहे”. त्यातल्या त्यात काही जणांचे रडणे माझं मन विचलीत करत होतं. सकाळी जेवढा उत्साह होता तो आता पुर्णपणे मावळलेला होता. आता मला या जागेची काय माहीत का पण भीती वाटायला सुरवात झाली होती. ज्या बाईंच्या हवालि माझ्या बाबांनी मला शाळेच्या पहील्या दिवशी दिलं होतं ती बाई मला पुढचे तिन वर्ष आवडली नाही. कीवा तिने शीकवलेली एखादी कवीताही आठवण राहीली नाही. हा पण पहील्याच दिवशी मला एक मित्र भेटला आषीश त्याने मला त्याच्या जवळ बसायला जागा दिली. त्याच्या पाटीवर काय लिहलय ते सांगीतले. पहीला दिवस माझा भेदारलेलाच गेला. आणी माझ्या शाळेचा दुसर्याच दिवशी मी “माझ्या पोटात दुखतय, मी जाणार नाही” असे शस्त्र काढले. पण ते वाया गेले. आणी मझ्याजवळ दुसर आण्खी कुठलही शस्त्र नव्हत म्हणुन मला गप गुमान शाळेत जावं लागलं. आज तसं पाहीलं तर माझा आज शाळेचा पहीला दिवस होता आणी मी १० वाजता शाळेत पोहोचलो होतो आणी शाळेच्या पटांगणात मुले खेळत होती, ते पाहुन माला जरा जास्तच मजा वाटली पण तो आनंद काही काळच टिकला. मंदिरात वाजते तश्या घंटेचा नाद ऎकु आला आणी मी परत माझ्या छोट्याश्या भाववीश्वातुन बाहेर आलो. सर्व मुलं एका रांगेत उभी राहत होति, आता परत पोटात गलबलायला लागलं होतं. थोड्याच वेळात सर्वजण एका सुरात राष्ट्रगीत म्हणायला लागले होते, देवाच्या कृपेने हे मला येत होतं, आईने आधीच्या दिवशी पाठ करवुन घेतलं होतं ना. मला काल हे ईतक सुंदर असेल असं वाटलं नव्हतं पण आज जेव्हा सर्व मुलं एकासुरत हे गात होते तेव्हा ईतक छान वाटत होतं की विचारु नका. ते संपल्यावर सर्व मुलं रांगेने शीस्तीत वर्गात गेले आणी परत गोंधळ सुरु झाला. (मी खरच सांगतो आता या गोष्टीला जवळपास २४ वर्ष झालेत पण पोटात जसं पहील्या दिवशी झालं तसच आजही मला होतं, गर्दीच्या ठीकाणी गेल्यावर.) आणी परत कालची सुंदर बाई वजा माहाभारतातली राक्षसीण (माहाभारताचा संदर्भ यासठी दिला कारण त्या वेळी सागर बंधुंचे माहाभारत दर रवीवारी बघायचो आणी खरच त्या राक्षसीणींची भीती वाटायची) वर्गात आली. तिनेही काहीतरी गहन भाषेत बोलायला सुरवात केली आणी समोर ठेवलेल्या काळ्या रंगाच्या भिंतिवर खडु घासायला लागली. हे मला नंतर समजल की याला फळा असही म्हणतात, तोपर्यंत ती माझ्यासाठी काळी भींतच होती. मग बर्याच वेळाने एका मुलाला उठवुन त्याला मारहाण सुरु झाली, ती का होतेय याचा मला काहीही बोध होत नव्हता. पण ते तांडव काही वेळातच शांत झालं पण आमची स्थिती कसाबा जवळ ठेवलेल्या कुक्कुटांसारखी झाली होती. मग परत तो मंदिरात होतो तसा घंटानाद झाला व काही समजायच्या आत मी वर्गाच्या बाहेर होतो. १ तस मस्त पाय व कपडे मातित मळवुन मि परत वर्गात आलो. आता बाईंचा पारा जरा खाली उतरलेला होता. कारण काही माहीत नव्हत पण जेवण केल्यामुळे पेंगत असाव्या असा मी चंग बांधला होता, मग बराच वेळ त्या डुलक्या देत होत्या आणी आम्ही मस्त्या करत होतो. जरा आवाज वाढला की परत त्याच गहन आवाजात काहीतरी गळ्यात अडकल्या सारखा आवाज करायच्या त्या. आणी परत आपल्या समाधीत लीन होत होत्या. शेवटि एकदाचे ५ वाजले असावेत, एक लांब घंटानाद झाला व सर्व मुले बाहेर पळायला लागली. मिही दरवाज्याबाहेर पडलो. बाबांची स्कुटर दिसली, जाउन बसलो मी. तेवढ्यात बाबांनी विचारले कसा गेला दिवस. माझ्याजवळ सांगायला तसं काही नव्हत. छानही नव्हत कींवा वाईटही नव्हत. पण अनुभव चांगला होता. आता काही विचार करायची शक्तीच नव्हती. जसा घरि पोहोचलो त्या वेळी आपसुकच तोंडातुन निघालं\n“”शाळा सुटली पाटी फुटली, आई मला भुक लागली…\nलहानपणी माझा सर्वांत आवडता खेळ कोणता असेल तर तो ‘क्रिकेट’. पाचवी पासून सातवी पर्यंत मला जेंव्हा कधी शाळेपासून सवड मिळायची, तेंव्हा मी गल्लीतल्या माझ्या सवंगड्यांसोबत ‘क्रिकेट’ खेळायचो. आम्ही मुले इतर खेळही खेळायचो, पण ‘क्रिकेट’ हा आमचा सर्वांत प्रिय असा खेळ होता. भारताचा एखादा अटीतटीचा सामना टि.व्ही. वर पहात असताना मी भावुकही व्हायचो तर तो ‘क्रिकेट’. पाचवी पासून सातवी पर्यंत मला जेंव्हा कधी शाळेपासून सवड मिळायची, तेंव्हा मी गल्लीतल्या माझ्या सवंगड्यांसोबत ‘क्रिकेट’ खेळायचो. आम्ही मुले इतर खेळही खेळायचो, पण ‘क्रिकेट’ हा आमचा सर्वांत प्रिय असा खेळ होता. भारताचा एखादा अटीतटीचा सामना टि.व्ही. वर पहात असताना मी भावुकही व्हायचो एकदा भारत अशाच एका अटीतटीच्या सामन्यात जिंकता जिंकता हरला, तेंव्हा मला माझे अश्रू अनावर झाले, इतकं माझं क्रिकेटवर प्रेम होतं.\nकालोघात ते सवंगडीही मागे पडले व तो खेळही मागे पडला. गेल्या दहा वर्षांत मी क्वचितच क्रिकेट खेळलो असेन. का कोणास ठाऊक पण क्रिकेट या खेळातील माझी रुची ही हळूहळू फारच कमी होत गेली. जसं मी क्रिकेट खेळणं सोडलं, तसं माझं क्रिकेट पाहणं देखील बंद झालं. आता तर मला ‘भारताचा सामना कधी आहे पण क्रिकेट या खेळातील माझी रुची ही हळूहळू फारच कमी होत गेली. जसं मी क्रिकेट खेळणं सोडलं, तसं माझं क्रिकेट पाहणं देखील बंद झालं. आता तर मला ‘भारताचा सामना कधी आहे’ हे देखील माहित नसतं, तेंव्हा भारताचे सामने टि.व्ही. वर पाहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’ हे देखील माहित नसतं, तेंव्हा भारताचे सामने टि.व्ही. वर पाहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही वर्तमानपत्रात येणार्या बातम्या वाचल्यानंतरच मला त्याबाबत माहिती होते. सतत होणार्या ‘मॅच फिक्सिंग’ मुळे क्रिकेट हा खेळ पाहण्यात काही ‘अर्थ’ उरला आहे, असे वाटत नाही.\nआय.पी.एल. ची लोकप्रियता ही तर माझ्यासाठी अगदी अनाकलनीय आहे पुण्याच्या टिममध्ये पुण्याचे खेळाडू असत नाहीत, मुंबईच्या टिममध्ये मुंबईचे खेळाडू असत नाहीत, केवळ पैसा आणि प्रसिद्धी डोळ्यासमोर ठेवून आय.पी.एल. च्या व्यवसायात उतरलेले उद्योजग ‘पुणे वॉरिअर्स’, ‘मुंबई इंडियन्स’ म्हणून लोकांना भावनिक आवाहन करतात आणि लोक भुलतात पुण्याच्या टिममध्ये पुण्याचे खेळाडू असत नाहीत, मुंबईच्या टिममध्ये मुंबईचे खेळाडू असत नाहीत, केवळ पैसा आणि प्रसिद्धी डोळ्यासमोर ठेवून आय.पी.एल. च्या व्यवसायात उतरलेले उद्योजग ‘पुणे वॉरिअर्स’, ‘मुंबई इंडियन्स’ म्हणून लोकांना भावनिक आवाहन करतात आणि लोक भुलतात पुण्याचे, मुंबईचे खेळाडू बाजूला राहूदेत.. कमीतकमी मराठी खेळाडू तरी महाराष्ट्रातील शहारांच्या नावाने असलेल्या टिममध्ये असावेत की नाही पुण्याचे, मुंबईचे खेळाडू बाजूला राहूदेत.. कमीतकमी मराठी खेळाडू तरी महाराष्ट्रातील शहारांच्या नावाने असलेल्या टिममध्ये असावेत की नाही आता काही लोक मला त्या टिममधील मराठी खेळाडूंची नावे सांगू लागतील.. पण मी इथे अपवादांबद्दल बोलत नसून संपूर्ण टिमबाबत बोलत आहे.\nलोकांनी स्वतःहून क्रिकेट खेळावे त्यातून चांगला शारिरीक व्यायाम होतो, पण सतत टि.व्ही. वर दुसर्यांचा खेळ पाहून वेळ वाया घालवण्यात काय अर्थ आहे मनोरंजनच हवे असेल, तर क्रिकेटहून अधिक चांगली अशी मनोरंजनाची कितीतरी साधने आहेत. शेवटी आवडी-निवडी या अगदी व्यक्तिगत असतात. पण आपल्या आवडी-निवडींमधून आपल्या जीवनात काही चांगला बदल होत आहे का मनोरंजनच हवे असेल, तर क्रिकेटहून अधिक चांगली अशी मनोरंजनाची कितीतरी साधने आहेत. शेवटी आवडी-निवडी या अगदी व्यक्तिगत असतात. पण आपल्या आवडी-निवडींमधून आपल्या जीवनात काही चांगला बदल होत आहे का याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. जर असा बदल होत असेल, तर आपण योग्य मार्गावर आहोत असे समजायला हरकत नाही. नाहीतर आपल्या आवडी-निवडी बदलायची वेळ आली आहे, असे निश्चित समजावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://shatadapremkarave.blogspot.com/2009/04/blog-post.html", "date_download": "2018-08-18T10:48:47Z", "digest": "sha1:XUF5AVZ2CSIWGTWRZM7GFF6IEK3TDKAG", "length": 1933, "nlines": 44, "source_domain": "shatadapremkarave.blogspot.com", "title": "शतदा प्रेम करावे: अलगद असे............", "raw_content": "\nनमस्कार मित्रानो. मी अनिल बिहाणी . मझ्याबाबातीत सांगण्यासारखे विशेष काहिच नाहि.मी एक् सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य मुलगा आहे.पण प्रत्येक समान्यात कुठे तरि असामन्यत्व द्डलेलं असतं.माझ्यातल्या या असामान्यत्वाचा शोध् घेणे सद्या सुरु आहे.\nअलगद असे भरून यावे\nशब्दानी मग विरून जावे\nकातर हलवे गाणे गावे\nबांध नकळत फुटून जावे\nपाउस असा पडून जाता\nमेघांनी मग निघून जावे \nजय हो तेरी गोविंदा ......\nही वाट दूर जाते .......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-18T10:58:37Z", "digest": "sha1:AUMABXGBYA7OZPAKGUE2IQPKHW2I6V47", "length": 16005, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "निगडीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास तीन पिस्तुल आणि दहा काडतुसांसह अटक - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे…\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची…\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Bhosari निगडीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास तीन पिस्तुल आणि दहा काडतुसांसह अटक\nनिगडीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास तीन पिस्तुल आणि दहा काडतुसांसह अटक\nपुणे, दि. ३० (पीसीबी) – निगडीतील एक सराईत गुन्हेगार वारजे माळवाडी येथील हॉटेल आम्रपाली जवळ गावठी पिस्तुल विक्री करण्यास गेला असता वारजे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तीन गावठी पिस्तुल आणि दहा काडतुसे असा एकूण एक लाख सहा हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.\nनिळकंठ सुर्यकांत राऊत (वय ३८, रा. भैरवनाथ हाऊसिंग सोसायटी रूपी नगर, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस नाईक आशिष बोटके यांना त्यांच्या खबऱ्या मार्फत बातमी मिळाली की, वारजे माळवाडी येथील महामार्गालगत असलेल्या हॉटेल आम्रपाली जवळ एकजण गावठी पिस्तुल विक्रीसाठी घेवून येणार आहे. पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी सापळा रचून नीलकंठ राऊत याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ तीन देशी बनावटीचे गावठी पिस्तुल आणि दहा जिवंत काडतूसे आढळून आली. पोलिसांनी त्याला अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३० जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. राऊत हा शहर पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापुर्वी घरफोडी, हत्यार बाळगणे, जबरी चोरी, वाहन चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.\nPrevious article४७६ षटकार ठोकून ख्रिस गेलची शाहीद आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी\nNext article४७६ षटकार ठोकून ख्रिस गेलची शाहीद आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nचिखलीतील पायी कावड यात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nमोदी लोकसभेसोबत रशियाची निवडणूकही घेऊ शकतात; संजय राऊतांचा उपरोधिक टोला\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nपुण्यातील रॅमी ग्रँड या पंचतारांकित हॉटेलात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश;...\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nदहा हजारांची लाच स्विकारताना ताथवडेतील महावितरणाच्या कार्यालयीन सहाय्यकाला रंगेहात अटक\nभोसरीत ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयाच्या वतीने शनिवारी मधुमेहाविषयी शिबिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/farmer-strike-and-sharad-pawar-twitter-49521", "date_download": "2018-08-18T10:40:20Z", "digest": "sha1:7ES2KM3LZ35HSCOJTMEQUV57KY62HBU5", "length": 10703, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "farmer strike and sharad pawar twitter शेतकरी संपाचा गांभीर्याने विचार करा- शरद पवार | eSakal", "raw_content": "\nशेतकरी संपाचा गांभीर्याने विचार करा- शरद पवार\nगुरुवार, 1 जून 2017\nपुणेः शेतकरी मी आता काही पिकवणार नाही या निष्कर्षाप्रत येतो, ही लहान गोष्ट नाही. याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे, असे माजी कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज (गुरुवार) ट्विटरवरून म्हटले आहे.\nशेतकरी मी आता काही पिकवणार नाही या निष्कर्षाप्रत येतो, ही लहान गोष्ट नाही. याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. (3/3)\nपुणेः शेतकरी मी आता काही पिकवणार नाही या निष्कर्षाप्रत येतो, ही लहान गोष्ट नाही. याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे, असे माजी कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज (गुरुवार) ट्विटरवरून म्हटले आहे.\nशेतकरी मी आता काही पिकवणार नाही या निष्कर्षाप्रत येतो, ही लहान गोष्ट नाही. याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. (3/3)\nत्यामुळे लोकशाही मार्गाने आपल्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत.\nउ. प्रदेशच्या पार्श्वभूमीवर अन्य राज्यांतही सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देईल, अशी अपेक्षा होती. पण बराच काळ यासंबंधी निर्णय झाला नाही.\nसिद्धूचे पाक लष्करप्रमुखांना अलिंगन\nनवी दिल्ली : पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला काँग्रेसचे नेते व भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांना खास आमंत्रण होते....\nभोकरदनमध्ये नदीत शेतकरी गेला वाहून\nकेदारखेडा (जि. जालना) - भोकरदन तालुक्‍यात गुरुवारी (ता. 16) झालेल्या पावसामुळे गिरिजा नदीला मोठ्या...\nधडपड - शेतकऱ्यांत विश्‍वास निर्माण करण्याची\nसातारा - शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते, हे दाखवून देण्यासाठी युवकाने शेअर फार्मिंगच्या (गटशेती) माध्यमातून खातवळ येथे ४० एकरांत करार शेती करण्याचे...\nसांस्कृतिक लोकधारांचे संवर्धन गरजेचे - सुप्रिया सुळे\nइंदापूर/ नीरा नरसिंहपूर - ‘लोप पावत चाललेल्या सांस्कृतिक लोकधारांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. यासाठी स्तुत्य उपक्रम अप्पासाहेब जगदाळे यांनी राबविला...\n'यूपीए' काळातच विकासदर अधिक\nनवी दिल्ली : केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या अहवालाच्या आधारे कॉंग्रेसने मोदी सरकारच्या आर्थिक प्रगतीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-tennis/sports-news-mallika-marathe-involve-international-tennis-competition-47696", "date_download": "2018-08-18T10:33:16Z", "digest": "sha1:QMHHD22D2A5IHBRVXAMRESULO6IKQDIC", "length": 13873, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news mallika marathe involve in international tennis competition मल्लिका मराठेची टेनिसमध्ये आंतरराष्ट्रीय भरारी | eSakal", "raw_content": "\nमल्लिका मराठेची टेनिसमध्ये आंतरराष्ट्रीय भरारी\nगुरुवार, 25 मे 2017\nटेनिसपटू मल्लिका मराठे हिने फ्रेंच ओपन ज्युनिअर पात्रता स्पर्धेचे तिकीट कमावले आहे. त्यासाठी झालेल्या स्पर्धेत तिने वय, अनुभवात सरस असलेल्यांवर मात केली. कारकिर्दीतील पहिल्यावहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ती सज्ज झाली आहे.\nपुण्याची १४ वर्षांची टेनिसपटू मल्लिका मराठे हिने फ्रेंच ओपनमधील ज्युनिअर गटाच्या पात्रता फेरीसाठी ‘वाइल्ड कार्ड’ मिळविले आहे. त्यासाठी दिल्लीत झालेल्या स्पर्धेत तिने विजेतेपद मिळविले. तिने वरच्या वयोगटातील मुलींना हरवून ही कामगिरी केली. १६ वर्षांखालील गटाच्या युर्बानी बॅनर्जीवर तिने मात केली. तीन शहरांत फेऱ्या झालेल्या स्पर्धेच्या मालिकेत सहभागी झालेली ती सर्वांत कमी वयाची खेळाडू होती. त्यामुळे तिची कामगिरी आणखी कौतुकास्पद ठरली. यामुळे कारकिर्दीतील पहिलीवहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा म्हणून ग्रॅंड स्लॅमचा संदर्भ ती कमावू शकली.\nमल्लिकाचे पहिले प्रशिक्षक संदीप कीर्तने यांनी सांगितले की, मल्लिकाच्या शब्दकोशात दडपण, भीती हे शब्दच नव्हते. मला तिचा हा गुण सर्वाधिक आवडला. तिला खेळाची आवड सुद्धा होती. ती खेळाचा आनंद लुटायची हे सुद्धा सांगावे लागेल. तिला नव्या गोष्टी शिकण्यात रस होता. वयाच्या मानाने तिचा दृष्टिकोन जास्त परिपक्व होता.\nअर्जुन पुरस्काराचे मानकरी असलेले संदीप तसेच मल्लिकाची आई वैजयंती आणखी एका गोष्टीचा उल्लेख करतात आणि तो म्हणजे तिला पराभवाची भीती वाटत नाही.\nटेनिसच नव्हे तर कोणताही खेळ मानसिक असतो. उत्तुंग कामगिरी केलेला एखादा खेळाडू झोनमध्ये गेलेला असतो, असे म्हटले जाते. ही अवस्था साधण्यासाठी साधकाप्रमाणे तपश्‍चर्या करावी लागते. मल्लिकाचे वैशिष्ट्य म्हणजे तिने ज्युनिअर पातळीवरच ही स्थिती साध्य केली आहे. वैजयंती यासाठी एक उदाहरण आवर्जून देतात. अहमदाबादमधील स्पर्धेच्यावेळी ४५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढले होते. त्याचवेळी मल्लिकाच्या पायाला फोड आले होते. त्यामुळे तिचे पाय दुखत होते. त्यानंतरही तिने विजेतेपद पटकावले.\nमल्लिकाचा एक डोळा लहानपणी थोडा नाजूक होता. अँब्लीओपिया असे यास संबोधले जाते. यावर मल्लिकाने मात केली. ज्युनिअर पातळीवर दीर्घ काळ सातत्य राखणे खडतर असते. मल्लिकाने त्यात यश मिळविले आहे. पुढे वरिष्ठ पातळीचा मार्ग खडतर असेल, पण ज्युनिअर पातळीवरील मल्लिकाची परिपक्वता पाहता ती हे आव्हान पेलेल असा विश्‍वास वाटतो.\nभाषणात मोठी ताकद आहे.. : बबन साळगांवकर\nसावंतवाडी : भाषणात मोठी ताकद आहे त्याच वक्तृत्वाचा फायदा घेऊन तब्बल 23 दिवसांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे पहिल्यांदा आमदार बनले आणि त्यांनी नंतर...\nबारामती - विद्या प्रतिष्ठानच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पुरस्कार\nबारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट...\nपंकज भूसे यांचा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव\nसरळगांव - महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी होऊन दिलेल्या उद्दिष्टा पेक्षा जास्त वृक्ष लागवड करून उत्कृष्ट कामगिरी केल्याने...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nपिंपळवंडीला मानव-बिबट सहजीवन जनजागृती\nजुन्नर - पिंपळवंडी ता.जुन्नर येथे मानव व बिबट संघर्ष व सहजीवन याविषयी मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती करण्यात आली. जुन्नर वन विभाग तसेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tarunbharat.com/news/category/uncategorized", "date_download": "2018-08-18T10:26:23Z", "digest": "sha1:H4FY4LDNDP2UXDNESNL2QYZUVFKYICJR", "length": 8873, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Top News Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nऑनलाईन टीम / औरंगाबाद : डॉ. वाय. एस. खेडकर इंटरनॅशनल शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितास बाधा येईल, अशी कुठलीही दंडात्मक वा इतर कारवाई करू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालायच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना बी. वराळे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांनी दिले. संदीप कानडे यांच्यासह 58 पालकांनी शाळेच्या शुल्कवाढी विरोधात याचिका केली आहे. पालकांनी संस्था, शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालकांकडे ...Full Article\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nऑनलाईन टीम / गोंदिया : गोंदियाच्या देवरी तालुक्मयातील डोंगरगावाला चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. डोंगरगावातील तब्बल 30 घरांचा काही भाग आणि छत कोसळले आहे. तसेच एका ठिकाणी छत कोसळून एक ...Full Article\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nऑनलाईन टीम / इस्लामाबाद : माजी क्रिकेटर आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान यांनी पाकिस्तानचे 22 वे पंतप्रधान म्हणून आज शपथ घेतली. भारतीय वेळेनुसार सकाळी पावणेअकरा ...Full Article\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळील उतारावर भरधाव कंटेनरची तीन वाहनांना धडक बसून विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात एक चालक जखमी झाला असून वाहनांचे ...Full Article\nमुंबई वगळून स्वतंत्र सह्याद्री रेल्वे झोन-ची मागणी\nऑनलाईन टीम / पुणे : रेल यात्री संघातर्फे पुण्यात मागणी, रेल्वे प्रशासन इंजिनचा पुरेपूर वापर करत नसल्याचा आरोप रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्र नेहमीच उपेक्षित राहिला आहे. मुंबईतील एकूण रहदारी ...Full Article\n20 ऑगस्टपासून ‘जवाब दो’ आंदोलन तीव्र करणार\nपुणे / प्रतिनिधी अंनिसचा इशारा, तपासातील दिरंगाईचा जाब विचारणार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला येत्या 20 ऑगस्ट रोजी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. ...Full Article\nराज्यमंत्री कांबळे यांच्या फ्लॅटमध्ये घरफोडी\nऑनलाईन टीम / पुणे : सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा वानवडी येथील परमार पार्क सोसायटीतील फ्लॅट चोरटय़ांनी फोडल्याने खळबळ उडाली. मात्र, आतमध्ये काहीच न मिळाल्यामुळे त्यांची घोर निराशा ...Full Article\nलोकसंख्येच्या प्रमाणात बौध्द समाजाला आरक्षण देण्यात यावे\nऑनलाईन टीम / पुणे देशातील विविध राज्यातील बौध्द समाजाची जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे. कारण संपूर्ण भारत देशामधील विविध राज्यात बौध्द समाज आहे. त्याचबरोबर जे आरक्षण बौध्द ...Full Article\nमराठी मनोरंजन क्षेत्रात ‘एसपीएन’ चे पहिले पाऊल\nऑनलाईन टीम / मुंबई : Sony मराठी ह्या नवीन वाहिनीच्या माध्यमातून Sony Pictures Networks India (SPN) मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये एक नवीन पायंडा घालू पाहत आहे. आजच्या काळाला अनुरूप असे ...Full Article\nकेरळमध्ये पावसाचा थैमान ; 24 तासांत 42 जणांचा मृत्यू\nऑनलाईन टीम / तिरूवनंतपुरम : केरळमध्ये पुराने कहर केला आहे. केरळमध्ये विध्वंसक पूर आला आहे. अनेक नद्या कोपल्या असून दरड कोसळण्याच्या घटनांत चोवीस तासांत 42 जणांचा मृत्यू झाला आहे. ...Full Article\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D-2/", "date_download": "2018-08-18T10:53:48Z", "digest": "sha1:NSNSS475PB364GBCTQPFUMZITEE5IQ2M", "length": 7618, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लोकपाल नियुक्तीची प्रक्रिया सुरु करण्यासाठी सरकारला न्यायालयाचे आदेश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nलोकपाल नियुक्तीची प्रक्रिया सुरु करण्यासाठी सरकारला न्यायालयाचे आदेश\nनवी दिल्ली : लोकपाल नियुक्तीसाठी असलेल्या निवड समितीतील प्रख्यात विधिज्ज्ञाची रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सध्या सुरु असल्याचे केंद्र सरकारने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. दरम्यान, लोकपाल निवडीची प्रक्रिया लवकर सुरु करण्यात यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला दिले.\nअॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडली. न्या. रंजन गोगोई यांच्या नेतृखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. दरम्यान, लोकपालच्या नियुक्तीसाठी निवड समिती स्थापन करण्यात आली असून यात प्रख्यात विधिज्ज्ञांची नियुक्तीची प्रक्रिया सुरु असल्याचे वेणुगोपाल यांनी न्या. गोगोई यांच्या खंडपीठासमोर सांगितले. केंद्र सरकारची बाजू ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, सध्या या संदर्भात कुठलेही आदेश देण्याचा आमचा विचार नाही. मात्र, लोकपालच्या नियुक्तीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करावी. तसेच या प्रकरणी १५ मे रोजी पुढील सुनावणी होईल असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमत्स्यसंवर्धनासाठी चांदा ते बांदा योजनेतून निधी\nNext articleमनरेगा, सामाजिक वनीकरणअंतर्गत आता शेतात वृक्षारोपण करता येणार\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा केरळ दौरा, ५०० कोटी रुपयाची मदत जाहीर\nकेरळमध्ये उद्भवलेल्या पूरग्रस्त परिस्थितीस राष्ट्रीय आपत्ती घोषित करा: राहुल गांधी\nविहिरीत सापडला शेतकऱ्याचा मृतदेह\nकेरळच्या मदतीस सरसावले अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, या राज्यांनी केली ‘एवढी’ मदत\nनिम्म्या कर्नाटकवर दुष्काळाचे सावट; मात्र काही भागांत पूरस्थिती\nकाश्‍मीरमधील ग्रेनेड हल्ल्यात एकाचा मृत्यूू, तिघे जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/we-are-being-jugllary-says-sanjay-nirupam-121846", "date_download": "2018-08-18T10:56:37Z", "digest": "sha1:PP3QVCCKNHILICANIXSKFGVJDS6YZ5J6", "length": 11070, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "we are being jugllary says sanjay nirupam शहांच्या दौऱ्यामुळे आम्ही नजरकैदेत : संजय निरुपम | eSakal", "raw_content": "\nशहांच्या दौऱ्यामुळे आम्ही नजरकैदेत : संजय निरुपम\nबुधवार, 6 जून 2018\nमुंबई : \"आम्हाला नजरकैदत ठेवले जात आहे\", असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज (बुधवार) केला. निरुपम यांच्या निवासस्थानी आज मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. अचानक तैनात करण्यात आलेल्या पोलिस बंदोबस्तामुळे निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली.\nमुंबई : \"आम्हाला नजरकैदत ठेवले जात आहे\", असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज (बुधवार) केला. निरुपम यांच्या निवासस्थानी आज मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. अचानक तैनात करण्यात आलेल्या पोलिस बंदोबस्तामुळे निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली.\nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज (बुधवार) मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यामुळे शहरात आज कडक पोलिस बंदोबस्त केला आहे. वरिष्ठांच्या आदेशावरुन सदर कारवाई केली जात आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. \"कदाचित भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावरमुळे आम्हाला नजरकैद केले जात आहे. आमच्या प्रश्नांची त्यांना भीती वाटत असावी.\" असा आरोप निरुपम यांनी केला. \"आजच हा पोलिस बंदोबस्त का केला. आम्ही असा काय गुन्हा केला आहे की, ज्यासाठी आम्हाला नजरकैदत ठेवले जात आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला.\nसिद्धूचे पाक लष्करप्रमुखांना अलिंगन\nनवी दिल्ली : पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला काँग्रेसचे नेते व भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांना खास आमंत्रण होते....\nपिंपरी - दोन मुलांना मारून वडिलांची आत्महत्या\nपिंपरी (पुणे) - दोन मुलांना मारून वडिलांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना शनिवारी दुपारी ताथवडे येथे घडली. शुभम बर्मन (वय १०) रूपम वर्मा (वय...\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%AB%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-18T10:58:15Z", "digest": "sha1:GUVDXVNNUQ4XO7YCI4DSJLEOY7RLY4IB", "length": 14698, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "लोणावळ्यात वृध्दाची गळफास घेऊन आत्महत्या - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे…\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची…\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Pune Gramin लोणावळ्यात वृध्दाची गळफास घेऊन आत्महत्या\nलोणावळ्यात वृध्दाची गळफास घेऊन आत्महत्या\nलोणावळा, दि. ७ (पीसीबी) – एका ६५ वर्षीय वृध्दाने राहत्या घरातील छताला साडीच्या किनारीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (दि.६) लोणावळ्यातील भुशी रामनगर येथे घडली.\nलक्ष्मण देवजी पालवे (वय ६५, रा. भुशी, रामनगर, लोणावळा) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या वृध्दाचे नाव आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी लोणावळ्यातील रामनगर येथे राहणाऱ्या लक्ष्मण पालवे या वृध्द व्यक्तीने राहत्या घराच्या छताला साडीच्या किनारीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आर.बी.मुंडे तपास करत आहेत.\nPrevious articleमराठा आरक्षण न्यायप्रविष्ट; आंदोलन करणे योग्य नाही – उच्च न्यायालय\nNext article मराठा आरक्षण न्यायप्रविष्ट; आंदोलन करणे योग्य नाही – उच्च न्यायालय\nराजगुरूनगर येथून स्वातंत्र्यदिनी गायब झालेल्या मुलाचा खून झाल्याचे उघड\nलोणावळ्यातील अमृतांजन पुलाजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात; एकजण जखमी\nदेहूगावात मंगळसुत्रासाठी विवाहितेचा खून; सासरा आणि दिराला अटक\nमुळशीत फायटर कोंबड्यांच्या झुंजीवर पैसे लावून जुगार खेळणारे १६ जण गजाआड\nमावळातील पाचर्णे येथे २५०० वृक्षांची लागवड\nउर्से येथे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग रोखून धरणाऱ्या आंदोलकांवर हायवे अॅक्टनुसार गुन्हा दाखल\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय १५ ऑगस्ट पासून ऑटो क्लस्टर येथून कार्यान्वित होणार\nचिखलीतील पायी कावड यात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nलोणावळ्यातील अमृतांजन पुलाजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात; एकजण जखमी\nमुक्त विद्यापीठांचे कोणतेही अभ्यासक्रम बंद नाहीत; यूजीसीचा खुलासा\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nरांजणगावमध्ये विरुध्द दिशेने आलेल्या भरधाव टेम्पोच्या धडकेत तिघांचा मृत्यू\nहिंजवडीतील आयटीपार्क कंपनीच्या गाड्यांची वाहतूक भुमकर चौक मार्गे वळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE-2/", "date_download": "2018-08-18T10:59:02Z", "digest": "sha1:3E4VUTA2QFPK6R6T5GHHDHRNPOYBAJCZ", "length": 14077, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मल्टिप्लेक्समध्ये आजपासून बिनधास्त न्या बाहेरचे खाद्यपदार्थ! - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे…\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची…\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Notifications मल्टिप्लेक्समध्ये आजपासून बिनधास्त न्या बाहेरचे खाद्यपदार्थ\nमल्टिप्लेक्समध्ये आजपासून बिनधास्त न्या बाहेरचे खाद्यपदार्थ\nमुंबई, दि. १ (पीसीबी) – मल्टिप्लेक्समध्ये आजपासून तुम्हाला बाहेरचे खाद्यपदार्थ नेता येणार आहे. शिवाय मल्टिप्लेक्सच्या आवारात मिळणारे खाद्यपदार्थही छापील किंमतीतच मिळतील. सरकारकडून या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत. जे मल्टिप्लेक्स हे आदेश पाळणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे.\nPrevious articleमल्टिप्लेक्समध्ये आजपासून बिनधास्त न्या बाहेरचे खाद्यपदार्थ\nNext articleमराठा आरक्षण: सकल मराठा समजाच्यावतीने आज राज्यभरात ‘जेलभरो’ आंदोलन\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nवाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातील रॅमी ग्रँड या पंचतारांकित हॉटेलात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश;...\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यालयाचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते उद्घाटन\nराहुल गांधी देशभरातील १५०० प्राध्यापकांशी संवाद साधणार\nपक्षाचे नेतृत्व करण्यावरून करूणानिधींच्या दोन्ही मुलांमध्ये धुसफूस\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पुजाऱ्याकडून जिवे मारण्याची धमकी\nराज-उध्दव यांचा मराठा आरक्षणाला विरोध – नारायण राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-18T10:53:39Z", "digest": "sha1:ROLXX2WSMXPZEIVC7RSJXUZRCHYAKN3Y", "length": 7214, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उद्धव ठाकरेंनी मुनगंटीवारांशी भेट नाकारली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nउद्धव ठाकरेंनी मुनगंटीवारांशी भेट नाकारली\nमुंबई : भाजपचे नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटण्यासाठी तूर्तास तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नकार दिला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र उद्धव ठाकरेंनी वेळ दिली नाही.\nउद्धव ठाकरेंनी भेट नाकारल्यामुळे शिवसेना आणि भाजप युतीची चर्चा लांबणीवर पडली आहे. अहमदनगरमध्ये शिवसैनिकांचं झालेलं दुहेरी हत्यांकाड, नाणार प्रकल्पाला वाढता विरोध, यामुळे युतीच्या चर्चेला खीळ बसल्याची सूत्रांची माहिती आहे.\nयाआधीच शिवसेनेने भविष्यात भाजपशी कुठलीही युती करणार नाही, असे स्पष्ट केले होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कालच बोलताना याबाबत स्पष्टीकरण दिले होते. ‘भाजपने आमचा मुका घेतला तरी, आता युती होणार नाही,’ तसेच, शिवसेना सत्ताधारी नसून फक्त टेकूधारी आहे आणि राजकीय अस्थिरता टाळण्यासाठी सत्तेत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. दरम्यान, आगामी सर्व निवडणुका शिवेसना स्वबळावर लढणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मेळाव्यातूनच जाहीर केलं होतं.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleIPL 2018 : कोलकाता समोर आज दिल्लीचे आव्हान\nबाल तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधारास अटक\nआणखी एक भीष्म पितामह गमवला : उध्दव ठाकरे\nसहृद्यी राजकारणी, सामाजिक स्थित्यंतराचा चालता-बोलता विश्वकोष काळाच्या पडद्याआड \nअटल बिहारी वाजपेयी यांच्यामुळे मी मुख्यमंत्री- मनोहर जोशी\nटीम इंडीयासोबत शरद पवारांचे इंग्लंडमध्ये ध्वजारोहण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/supreme-court-refuses-urgent-hearing-regarding-union-budget-24908", "date_download": "2018-08-18T11:05:19Z", "digest": "sha1:CGQVLZDDUASLHA3LVJGR73GCO7BYBWGB", "length": 10716, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Supreme Court refuses urgent hearing regarding Union Budget अर्थसंकल्पावर तातडीने सुनावणीस कोर्टाचा नकार | eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्पावर तातडीने सुनावणीस कोर्टाचा नकार\nशनिवार, 7 जानेवारी 2017\nया काळात पाच राज्यांतील निवडणुका होणार असल्यामुळे सरकारला अर्थसंकल्प सादर करण्यापासून रोखण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. विरोधी राजकीय पक्षांनीही निवडणुकांच्या काळात अर्थसंकल्प सादर करण्यास विरोध दर्शविला आहे\nनवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्प पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर सादर करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. या प्रकरणी आम्हाला कोणतीही घाई नाही. ज्या वेळी हे प्रकरण सुनावणीला येईल, त्या वेळी त्यावर निर्णय दिला जाईल, असे मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केले.\nएम. एल. शर्मा या वकिलाने ही याचिका दाखल केली आहे. केंद्र सरकार 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या काळात पाच राज्यांतील निवडणुका होणार असल्यामुळे सरकारला अर्थसंकल्प सादर करण्यापासून रोखण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. विरोधी राजकीय पक्षांनीही निवडणुकांच्या काळात अर्थसंकल्प सादर करण्यास विरोध दर्शविला आहे.\nपंतप्रधान मोदी केरळमध्ये दाखल ; पुरपरिस्थितीचा आढावा घेणार\nतिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरात आत्तापर्यंत 300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर कोट्यवधींचे...\nपावसमध्येही होमिओपॅथिक हॉस्पिटल उभारू - राऊत\nरत्नागिरी - हार-तुऱ्यांसाठी आमची पदे नाहीत. जनसेवेची आमची भूमिका आहे. १०० टक्के समाजकार्य करून तुमचे आशीर्वाद मिळविण्यातच आम्हाला धन्यता मिळते....\nबापजी गेले. आज पुन्हा एकदा माझ्या डोक्‍यावरचे वडिलांचे छत्र हरपले. निव्वळ अवर्णनीय दु:खाचा दुसरा आघात आज माझ्यावर झाला आहे. मन एका क्षणात...\nव्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला घटस्फोट\nपुणे - भारतात विवाह झालेल्या मात्र, परदेशात स्थायिक झालेल्या एका जोडप्याने नुकताच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घटस्फोट घेतला. नोकरीनिमित्त पती...\nAtal Bihari Vajpayee : ठाकरे कुटुंबाने घेतले वाजपेयींचे अंत्यदर्शन\nमुंबई - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यदर्शनाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/zp-employee-strike-35371", "date_download": "2018-08-18T11:01:08Z", "digest": "sha1:Y6PMCHXOMO7VX4NFUKCG7ZQU72SZ7KUU", "length": 14152, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "ZP employee strike अर्थ व्यवहार राहिले ठप्प | eSakal", "raw_content": "\nअर्थ व्यवहार राहिले ठप्प\nगुरुवार, 16 मार्च 2017\nकोल्हापूर - विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेने आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे जिल्हा परिषदेतील आर्थिक बाबीशी संबंधित असलेली कामे आज ठप्प राहिली. कर्मचाऱ्यांतर्फे आज जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन सुरू केले असून, यामध्ये जिल्ह्यातील दीडशे कर्मचारी सहभागी झाले आहेत.\nकोल्हापूर - विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेने आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे जिल्हा परिषदेतील आर्थिक बाबीशी संबंधित असलेली कामे आज ठप्प राहिली. कर्मचाऱ्यांतर्फे आज जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन सुरू केले असून, यामध्ये जिल्ह्यातील दीडशे कर्मचारी सहभागी झाले आहेत.\nजिल्हा सेवा वर्ग-3 लेखा श्रेणी-1 मध्ये असलेले पद सहायक लेखा अधिकाऱ्यांना राजपत्रित दर्जा मिळावा, ग्रेड पे मिळावा, महाराष्ट्र रोजगार हमी योजना व इंदिरा आवास योजनेंतर्गत पंचायत समितीवर सहायक लेखा अधिकारी पद निर्माण करावे, लेखा लिपिक परीक्षा, उपलेखापाल परीक्षा व लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र वित्त व लेखा (जिल्हा परिषद) सेवा वर्ग-3ची परीक्षा शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे स्पर्धा परीक्षा जाहीर करावी, सहायक लेखाधिकारी पदावर पदोन्नती देण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्याला शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रशिक्षण द्यावे, पंचायत समिती स्तरावर कोषागार कार्यालयाप्रमाणे लेखा विभागाचे कामकाज करण्यात यावे, गट स्तरावर सहायक लेखाधिकारी यांना विशेष वित्तीय अधिकार द्यावे, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वर्ग-3च्या परीक्षा दरवर्षी घ्याव्यात, जिल्हा परिषद अंतर्गत लेखा कर्मचाऱ्यांचे जॉब चार्ट तयार करावे, पंचायत समिती स्तरावर लेखा अधिकारी वर्ग 2चे पद निर्माण करावे, आदी मागण्यांसाठी राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेतर्फे 10 मार्चपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारीही सहभागी झाले आहेत. पहिल्या टप्प्यात काळ्या फिती लावून काम केले. शासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ आजपासून लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. कामावर हजर राहून हे आंदोलन केले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या दारात मंडप घातला आहे. या वेळी शासनाच्या निषेधार्थ घोषणाही दिल्या.\nआंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, कार्याध्यक्ष अनिल माळवे, उपाध्यक्ष वैशाली पवार, बी. डी. पाटील, सचिव अशोक पाटील, कोषाध्यक्ष संतोष ओतारी, विजय देसाई, वसंत गाडे, महावीर सोळांकुरे, सुधाकर कांबळे, धनाजी जाधव आदी सहभागी झाले आहेत.\nदरम्यान, या आंदोलनाला जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सचिन जाधव यांनी पाठिंबा दिला आहे.\nटाकवे बुद्रुक - सावित्रींच्या लेकींना दुस-या टप्प्यात पंधरा सायकलींचे वाटप\nटाकवे बुद्रुक - आंदर मावळाच्या मिंडेवाडी तील ठाकरवस्ती, चावसरवस्ती, जाधववाडीतून पायपीट करीत येणा-या विद्यार्थ्यांसह सावित्रींच्या लेकींना दुस-या...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nभाषणात मोठी ताकद आहे.. : बबन साळगांवकर\nसावंतवाडी : भाषणात मोठी ताकद आहे त्याच वक्तृत्वाचा फायदा घेऊन तब्बल 23 दिवसांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे पहिल्यांदा आमदार बनले आणि त्यांनी नंतर...\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nबारामती - विद्या प्रतिष्ठानच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पुरस्कार\nबारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.vicharyadnya.com/2010/12/adhryavarati-vikas-padala-apaghatachi-kahani-marathi-parody-song.html", "date_download": "2018-08-18T10:34:28Z", "digest": "sha1:WZ73MONXUZ6QMBHLLRLONZ3WRUTFCKIT", "length": 15357, "nlines": 98, "source_domain": "www.vicharyadnya.com", "title": "अर्ध्यावरती विकास पडला.. अपघाताची कहाणी ..", "raw_content": "\nअर्ध्यावरती विकास पडला.. अपघाताची कहाणी ..\nआज ३० डिसेम्बर. मागच्या वर्षी याच दिवशी मला अपघात झाला होता. त्याच्या वेदना आजही ताज्याच आहेत. तुम्हाला त्या अपघाताची कहाणी सांगावीशी वाटतेय.\nमी नेहमीप्रमाणे रात्री ८ वाजता घरी परतत होते.\nआमचं धुळ छोटसं असलं तरी विकासासाठी पछाडलेलं त्याचं ते विकासाचं व्यसन तुम्हांला जागोजागी दिसेल. आपल्या शहराला असं वाईट म्हणणं मला पटत नाही, पण तुम्ही समजू शकता, अशी व्यसनं कुणाला लागतात, नाव तर शहराचं बदनाम होतं. हे व्यसन असंय की धुळ्याला मुंबई व पुण्यासारख बनवायचंय उड्डाणपूल, रस्त्यावर दुभाजक मोठ्मोठे होर्डिंग्स त्याचं ते विकासाचं व्यसन तुम्हांला जागोजागी दिसेल. आपल्या शहराला असं वाईट म्हणणं मला पटत नाही, पण तुम्ही समजू शकता, अशी व्यसनं कुणाला लागतात, नाव तर शहराचं बदनाम होतं. हे व्यसन असंय की धुळ्याला मुंबई व पुण्यासारख बनवायचंय उड्डाणपूल, रस्त्यावर दुभाजक मोठ्मोठे होर्डिंग्स (आमचं भाग्य हे विकासरूपी भूत बेंगलुरू, दिल्ली बघून आलं नाही, नाहीतर पाच मिनिटांच्या कामासाठी आम्हाला भुयारी रेल्वेत बसावं लागलं असतं (आमचं भाग्य हे विकासरूपी भूत बेंगलुरू, दिल्ली बघून आलं नाही, नाहीतर पाच मिनिटांच्या कामासाठी आम्हाला भुयारी रेल्वेत बसावं लागलं असतं) स्वप्न छान आहे, पण आपण जसं असेल तसं रहाव जसं असेल तसंचं फुलाव, यात काय गैर आहे. व्यावसायिक पणे बनविलेला बगीचा सुंदर दिसतो म्हणून नाजूक रानफुलांचं महत्व आणि सौंदर्य कमी होत नाही.\nधुळ हे शहर लहान आहे. इथले रस्ते लहान आहेत, जीवन वेगळं आहे आणि आवश्यकता पण अशा स्थितीत हे विकासाचं वेड कसं जीवघेण ठरू शकत याची ही कहाणी.\n\"रस्ते थोडे आणि दुभाजकच फार\nतर........ पुन्हा कथेकडे वळू. ती एक वादळी रात्र होती. लगेच संधी साधून विजेने लपंडाव खेळायला सुरुवात केली. पथदिवे अर्थातच बंद रस्त्यावर काळाकुट्ट अंधार काळा रंग फिक्कट वाटावा इतका खरं म्हणजे इथे राहूनही मला माहित नाही, पथदिवे नक्की कधी चालू असतात आणि कधी बंद खरं म्हणजे इथे राहूनही मला माहित नाही, पथदिवे नक्की कधी चालू असतात आणि कधी बंद त्यामुळे आंम्हाला या अंधाराच काही नवीन नाही. तरीही मी भीत भीतच गाडी (दुचाकी) चालवत होते. अंधारात काही समजत नव्हत (गाडीचा दिवा असून नसल्यासारखा.) म्हणून एका कडेने 'डाव्या बाजूने' \nआणि अचानक मला समोर एक छोटासा क्रूर राक्षस प्रकट झालेला दिसला,त्याचा आकार एका छोट्याशा टेकडीसारखा होता, बुटका राक्षस शरीर अंधारापेक्षा काळ त्याची त्वचा पण विचित्रच. तो राक्षस म्हणजे विकासाचा हस्तक होता. तिथे रस्त्याचे चौपदरीकरण सुरु होते. (कुठलेही सूचनाफलक, \"काम चालू रस्ता बंद \" किंवा \"डेंजर\" वगैरे काहीच नाही कमीत कमी \"तुमचे काम बंद करण्यासाठी रस्ता बंद\" असं तरी लिहायचं ना काहीही नाही.) बर चौपदरीकरण म्हणजे साडीचा पदर घेतात तसं काही असत का, हवा तसा मोठा करायचा वगैरे काहीही नाही.) बर चौपदरीकरण म्हणजे साडीचा पदर घेतात तसं काही असत का, हवा तसा मोठा करायचा वगैरे मराठी फारच कठीण आहे.\nचौपदरीकरण करायला रस्त्याच्या कडेला जागाच नव्हती. म्हणून खडी रस्त्यावर टाकली होती. अरे तो बुटका राक्षस म्हणजे खडी होती.....दिवसा ढवळ्या पण तो राक्षस नीट दिसत नव्हता रात्रीचं काय तो बुटका राक्षस म्हणजे खडी होती.....दिवसा ढवळ्या पण तो राक्षस नीट दिसत नव्हता रात्रीचं काय ( दुसऱ्या दिवशी उजेडात पाहिलं.)\n\"विकास नको पण खडी आवर\nकाही समजायच्या आत गाडी खडीच्या टेकडीवरून खाली मी जमिनीवर माझ्या अंगावर गाडी चालू अवस्थेत आणि माझे पाय गाडीखाली अटक्लेले\nमदतीसाठी ओरडायचा प्रयत्न केला, आवाजपण निघेना कसं तरी मागे वळून पाहण्याचा प्रयत्न केला, रस्त्यावर एखाद दुसरी दुचाकी जाताना दिसत होती. कुणीच आलं नाही. हताश होऊन तोंडातून निघालं, \"आई कसं तरी मागे वळून पाहण्याचा प्रयत्न केला, रस्त्यावर एखाद दुसरी दुचाकी जाताना दिसत होती. कुणीच आलं नाही. हताश होऊन तोंडातून निघालं, \"आई\", \"आई\" आईला बाळाची हाक लगेच ऐकू जाते, ती धावून आली. आई म्हणजे परमेश्वर\nअचानक लोक आले, गर्दी झाली, लोकांनी पटकन गाडी उचलली. मी कशीतरी उठले. नाकाखालून रक्त कसंतरी त्यांना \"Thanks\" म्हणून. पुन्हा गाडी चालू केली आणि घराकडे निघाले (गाडीचे Handel वाकडे झालेले होते.) कशीतरी येऊन पोहोचले घरी.\nघरी आल्यावर दिसलं, पाय खाडीवरून गाडीच्या वेगाबरोबर घासला गेलाय. ही बारीक खडी होती. भयंकर व्रण\nपुढचं सगळं नेहमीचंच... प्राथमिक उपचार वगैरे\nदुसऱ्या दिवशी वेदना शिगेला पोहोचल्या. मला सहनच होत नव्हतं, एकीकडे भयंकर यातना आणि एकीकडे संताप, त्या अर्धवट विकासाचा....... अशा वेळा एक गाणं हृदयातून उठलं.........\nगाणं प्रसिद्ध आहे......आपल्या ओठांवर आहे,\n\"भातुकलीच्या खेळामधली....... \" त्यावरच हे गाणं.....पहिलं कडवं मागच्या वर्षी त्या भयंकर यातनांमध्ये आणि संतापात उठलेलं, बाकीचं आत्ताच ........\nमरण झाले सस्ते...|| धृ ||\n'विकास' वदला मला न समजे\nत्या जनतेच्या डोळा तेव्हा\nअपघाताची कहाणी.. || १ ||\nजनता वदली बघत एकटक\nउद्या पहाटे दुसऱ्या वाटा\nपण विकासा कधी नं कळली\nगुढ विकल ही वाणी\nअपघाताची कहाणी ...|| २ ||\nतिला विचारी 'विकास' का तू\nका नं प्रजेचे जीवन आम्ही\nया प्रश्नाला उत्तर नव्हते\nअपघाताची कहाणी ... || ३ ||\nत्या 'राजा' ने मिटले डोळे\nत्या प्रजेचा श्वास कोंडला\nअपघाताची कहाणी ... || ४ ||\nमूळ गाण्याचे शब्द इथे आहेत आणि पूर्ण गाणं इथे सुरु आहे. गाणं आणि बोल उपलब्ध करून दिल्याबद्दल या संकेतस्थळांना धन्यवाद आणि सुंदर छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्या छायाचित्रकारांना आणि संकेतस्थलांनाही धन्यवाद खूप खूप\nया अपघातामुळे मला चार महिने नुसती विश्रांती घ्यावी लागली आणि MBA किंवा M.Tech ला प्रवेश घेता आला नाही. डोळ्यासमोर असलेलं स्वप्न, इतकं सहज दूर गेलं. शेवटी एकच म्हणावास वाटतंय ...\n\"विकासाचा खेळ होतो, पण जनतेचा जीव जातो.\"\nगणपती उजव्या सोंडेचा की डाव्या - भ्रम, भीती, आणि वास्तव\nगणेश पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे सगळे खरे आहे का\nसोवळे-ओवळे ही फसवणूक कुणाची\nसोवळे मोडले या विषयावरून फसवणुकीचा गुन्हा आणि पुढचे वाद सध्या सुरु आहेत. याविषयावर मनात सोवळ्या ओवळ्याच्या विश्वास व वादांवर काही मूलभूत प्रश्न उठले. त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात आहे. या पोस्टचा उद्देश केवळ एका विशिष्ट घटनेवर चर्चा करण्याचा नाही त्यामुळे कृपया कुठलेही मत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी मानू नये.\nकाल काय लिहावं सुचत नव्हतं. त्यावेळी माझ्या कवितेनेच मला प्रेरणा दिली. ती प्रेरणाच आजची कविता \"कविता हृदयात वसणारी\"\nप्रतिमा: कृष्णमोहिनी प्रतिमा ब्लॉगसंग्रहातून\nमी कविता तुझ्या हृदयात वसणारी\nकॉपीराईट: या ब्लॉग वरील सर्व कविता व लेख यांचे सर्वाधिकार ब्लॉग लेखिकेकडे सुरक्षित. या ब्लॉगवरील कुठलाही कन्टेन्ट इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट माध्यमात पुनर्प्रकाशित करण्यापूर्वी लेखिकेची लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे. ©️ मोहिनी पुराणिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/tejas-train-starting-24th-may-46591", "date_download": "2018-08-18T10:38:24Z", "digest": "sha1:NXLVNN76SLUZDIZZIFPEWODNPRPOSXWA", "length": 10965, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "tejas train starting from 24th May तेजस ट्रेन 24 मे पासून सेवेत येणार | eSakal", "raw_content": "\nतेजस ट्रेन 24 मे पासून सेवेत येणार\nशनिवार, 20 मे 2017\nमुंबई - कोकण मार्गावर धावणारी आणि साडे आठ तासांत सीएसटी ते कर्माली अंतर कापणारी वेगवान अशी तेजस ट्रेन प्रत्यक्षात 24 मे पासून सेवेत येणार आहे. या ट्रेनला रेलवेमंत्री सुरेश प्रभु यांचा हस्ते 22 मे रोजी मुंबईतून हिरवा कंदील देण्यात येईल. वाय-फाय, सर्वोत्तम जेवण, चहा-कॉफीसाठी मशीन्स आणि सीटबरोबर एलसीडी स्क्रीन असलेली ही वातानूकूलीत रेल्वे असणार आहे.\nएसी चेअर कार -1080 रुपये\nएग्ज़िक्युटिव - 2340 रुपये\nमुंबई - कोकण मार्गावर धावणारी आणि साडे आठ तासांत सीएसटी ते कर्माली अंतर कापणारी वेगवान अशी तेजस ट्रेन प्रत्यक्षात 24 मे पासून सेवेत येणार आहे. या ट्रेनला रेलवेमंत्री सुरेश प्रभु यांचा हस्ते 22 मे रोजी मुंबईतून हिरवा कंदील देण्यात येईल. वाय-फाय, सर्वोत्तम जेवण, चहा-कॉफीसाठी मशीन्स आणि सीटबरोबर एलसीडी स्क्रीन असलेली ही वातानूकूलीत रेल्वे असणार आहे.\nएसी चेअर कार -1080 रुपये\nएग्ज़िक्युटिव - 2340 रुपये\nएसी चेएर कार- 1185\nएसी चे एर कार - 1175\nएग्ज़िक्युटिव - 2570 रुपये\nएसी चेअर कार -1155\nभाषणात मोठी ताकद आहे.. : बबन साळगांवकर\nसावंतवाडी : भाषणात मोठी ताकद आहे त्याच वक्तृत्वाचा फायदा घेऊन तब्बल 23 दिवसांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे पहिल्यांदा आमदार बनले आणि त्यांनी नंतर...\nपंकज भूसे यांचा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव\nसरळगांव - महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी होऊन दिलेल्या उद्दिष्टा पेक्षा जास्त वृक्ष लागवड करून उत्कृष्ट कामगिरी केल्याने...\nचौपदरीकरणातील पुलांची कामे संथ\nरत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावरील पुलांची कामे त्वरेने सुरू झाली, मात्र त्यानंतर त्यांची गती संथ झाल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून केंद्र...\nAtal Bihari Vajpayee : दौंडकरांना आठवली ३४ वर्षांपूर्वीची सभा\nदौंड - दौंड तालुक्‍यात कोणतीही निवडणूक नसताना आणि भाजपची सत्ता नसताना ३४ वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सभेला अलोट गर्दी झाली होती. जिल्हा...\nएसटी वेतनवाढीचा तिढा कायम\nमुंबई - वेतनवाढीसाठी अघोषित संप करून एसटी प्रशासनाला खिंडीत गाठणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वाढीव वेतनाचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.vicharyadnya.com/2018/08/aarkshn-ilaj-ki-ek-aajar-marathi-lekh.html", "date_download": "2018-08-18T10:34:20Z", "digest": "sha1:H7LKQMDXEW3XZZH6JJGUJRGC3AXMQAMQ", "length": 16467, "nlines": 70, "source_domain": "www.vicharyadnya.com", "title": "आरक्षण - इलाज की एक आजार?", "raw_content": "\nआरक्षण - इलाज की एक आजार\nआरक्षण हा समस्येवरचा इलाज आहे की एक सामाजिक आजार बनतोय याच्या मुळाशी जाऊन समस्येचा सखोल विचार करणारा लेख 'आरक्षण इलाज की एक आजार\nभारतात आरक्षण मिळावे म्हणून वर्षभर देशाच्या कुठल्या ना कुठल्या भागात आंदोलने सुरू असतात. सध्याही सुरूच आहेत. आजपासून ५-१० वर्षांनीही कदाचित हा लेख त्या काळासाठी असाच लागू पडेल.\nआरक्षण विशिष्ट वर्गासाठी आवश्यक का आहे हे सांगणारे आपल्या समाजावर झालेल्या अन्यायाची कहाणी वर्णन करताना दिसतात. तथाकथित उच्चवर्णीय कसे द्वेषास पात्र आहेत याचीही तावातावाने चर्चा होते. याउलट आरक्षणामुळे आपले नुकसान होते, अपात्र उमेदवार कसे पुढे जातात याचे शल्य उग्र पणे मांडणारा वर्गही आता तयार होत आहे. नजिकच्या भविष्यात या वर्गास सत्ताधाऱ्यांना दुर्लक्षिता येणार नाही.\nया सर्वांत थोडा सामंजस्यवादी विचार मांडला जातो तो म्हणजे आर्थिक निकषांवर आरक्षण देणे.\nपण आर्थिक निकषांवर आरक्षण दिले तरी ते समस्येवर औषध होईल का याचा विचार व्हायला हवा.\nमुळात विचार व्हायला हवा; घोषणा, तोडफोड या मार्गांनी समस्या सुटणार नाहीत.\nगरीबीमुळे वंचित राहिलेल्या वर्गास प्रगतीसाठी लहानपणापासून शिक्षणाच्या समान संधींची आवश्यकता आहे. सुरुवात शिक्षण संस्थांपासून आहे. उत्तम शाळा, तज्ज्ञ शिक्षक, अभ्यासासाठी सुसज्ज वाचनालये, शिक्षकांचे प्रेमाने -- कठोरतेने नाही -- शिकवणे आणि मार्गदर्शन करणे हे झाले पाहिजे. भरमसाठ फी भरणाऱ्या विद्यार्थ्यांनाही हे सगळे बऱ्याच खासगी संस्थांत सुद्धा उपलब्ध नाही. आताच्या काळात विद्यार्थ्यांना शाळेनेच इ-पुस्तके मोफत उपलब्ध करून देणे शक्य आहे. पण ते होते का असा मूलभूत विचार व्हायला हवा.\nशिक्षक आपल्या विषयात अनुभवी, तज्ज्ञ नसतील तर त्यांच्या शिकविण्याने आरक्षणाने प्रवेश मिळालेले व मुक्त वर्गातले, अशा सगळ्याच विद्यार्थ्यांचे नुकसानच होईल. शिक्षकांचा आणि अभ्यासक्रमाचा स्तर उच्च राहील यासाठी सरकारी धोरण काय आहे आणि असेल तर ते पाळले जाते का या प्रश्नावर विचार व्हायला हवा. आरक्षण देणे हा काही समस्येवरचा पूर्ण इलाज नाही.\nएकदा सुशिक्षित विद्यार्थी घडला की तो स्वतःसाठी संधी निर्माण करु शकतोच पण इतरांनाही रोजगार देऊ शकतो. पदवीपर्यंत शिक्षण झाल्यावर नोकरीत व पदोन्नतीत आरक्षणाची गरज पडू नये असे मला वाटते. आरक्षणाने जातीच्या कुंपणांत स्वतःला आपण सुरक्षित करीत आहोत असे वरवर पाहता वाटत असले तरी आपण मुक्त आकाशात झेप घेण्याची संधी मात्र आपल्या मनातूनच नष्ट करीत आहोत.\nयोग्यतेचे निकष कमी करण्याने सामाजिक समानता कशी येईल\nवेगवेगळ्या योग्यतेचे वर्ग एकाच स्थानावर -- केवळ जातीच्या आधारावर -- आणण्याने सामाजिक समानता अधिकच दूर होत जाणार नाही का\nआरक्षण मिळावे म्हणून अनावर संताप, आत्महत्या हा इलाज कसा होईल अशा प्रकारचे ब्लॅकमेल निवडणुका जवळ आल्या की अचानक वाढते हे आता गूढ राहिलेले नाही.\nआरक्षणाच्या मागणीच्या पूर्ततेसाठी युवक आत्महत्या करतात हे अत्यंत दुःखद आहे. नेतृत्वाने ऊर्जासंपन्न युवाशक्तीला योग्य दिशा दाखविली नाही याचेच हे द्योतक आहे.\nआपल्या मागण्या मांडण्यासाठी जर युवक संगठित होऊ शकतो तर मग हीच ऊर्जा स्वतः चा संगठित व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरता येऊ शकते. व्यवसायाभिमुख दृष्टिकोन ठेवल्यास सार्वजनिक मालमत्ता नष्ट करण्यासाठी युवाशक्ती 'वापरण्याऐवजी' देशाच्या विकासात योगदान देणारी ठरेल.\nअनुभवी नेतृत्वाने युवकांना भडकविण्याऐवजी त्यांना मार्गदर्शन करावे, सरकारने व्यवसायासाठी आवश्यक ट्रेनिंग व साधने द्यावी हे सगळ्यांच्या अधिक हिताचे होणार नाही का आरक्षण मागणे आणि त्यासाठी आत्महत्या करणे निराशवादास प्रोत्साहन देणारे आहे.\nसत्तेसाठी राजकीय घटकांचा असे विषय तापविण्याने कदाचित फायदा होईलही पण समाज व राष्ट्रबांधणीसाठी आरक्षण किती काळ उपयुक्त ठरेल समाजात तेढ माजवून सामाजिक समरसतेची, एकात्मतेची भाषणे देणे किती प्रामाणिक आहे समाजात तेढ माजवून सामाजिक समरसतेची, एकात्मतेची भाषणे देणे किती प्रामाणिक आहे नेताच याप्रमाणे अप्रामाणिक असेल तर जनता विशेषतः युवक काय प्रेरणा घेतील\nयुवकांना संधी, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि मुख्य म्हणजे संसाधने यांची गरज आहे; आरक्षण हा कायमचा उपाय नाही.\nदुर्दैवाने वैचारिक दारिद्र्य हे सध्या योग्यतेचे मापदंड ठरत आहेत. त्यामुळे नेता म्हणून कोणाकडे बघावे व त्यांच्याकडून जनतेने काय अपेक्षा ठेवाव्यात हा मोठा प्रश्नच आहे.\nस्पर्धा वाढली तर प्रत्येक स्पर्धकास जिंकण्यासाठी अधिकाधिक मेहेनत घ्यावी लागते. व्यवसायात स्पर्धा वाढली तर कुठल्याही समाजाचे नुकसान होणार नाही उलट इनोव्हेशन करणे -- नवनवीन कल्पना, उपक्रम शोधणे भाग पडेल, ज्याने अर्थातच सगळ्यांचा विकास होईल.\nत्यातूनच बुद्धिमान जन निर्माण होऊ शकतात. आता आरक्षण मिळविण्यासाठी आंदोलन करणारे आपल्या भावी पिढ्यांचे दीर्घकालीन नुकसानच करीत आहेत. आरक्षण मागणे एकप्रकारे आपले पंख बांधून चालत जगण्याचा निश्चय करण्यासारखेच आहे. ज्या उच्चवर्णीयांना दुःख वाटते की आपला हक्क जातोय त्यांनी असा दृष्टिकोन ठेवावा की स्पर्धेमुळे तावून सुलाखून निघण्याने त्यांचा फायदाच होत आहे. बुद्धीच जगावर राज्य करते.\nआज केवळ बुद्धीच्या बळावर फेसबुक, व्हॅट्सऍप, गूगल हे आपल्या दैनंदिन जीवनावर राज्य करीत आहेत. आपण त्यांच्याशिवाय जगूच शकत नाही. आपल्या समाजाच्या कुंपणापलीकडचं हे जग आहे, पण आपली जातीय आंदोलने पसरविण्यासाठी आपण रोज त्यांचाच उपयोग करतो.\nजागतिक व्यवसाय-साम्राज्ये आरक्षणामुळे निर्माण झालेली नाहीत.\nविचारयज्ञ मध्ये अन्य विचारप्रवर्तक लेख:\nसोवळे-ओवळे ही फसवणूक कोणाची\nभगवान परशुराम - अधर्माविरुद्धचा चिरंजीव धर्मयोद्धा\n'केशव मनोहर लेले' मन विषण्ण करणारा अनुभव\nआरक्षण राजकीय लेख सामाजिक\nहा विचारयज्ञ आपल्या विचारांची वाट बघतोय........\nगणपती उजव्या सोंडेचा की डाव्या - भ्रम, भीती, आणि वास्तव\nगणेश पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे सगळे खरे आहे का\nसोवळे-ओवळे ही फसवणूक कुणाची\nसोवळे मोडले या विषयावरून फसवणुकीचा गुन्हा आणि पुढचे वाद सध्या सुरु आहेत. याविषयावर मनात सोवळ्या ओवळ्याच्या विश्वास व वादांवर काही मूलभूत प्रश्न उठले. त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात आहे. या पोस्टचा उद्देश केवळ एका विशिष्ट घटनेवर चर्चा करण्याचा नाही त्यामुळे कृपया कुठलेही मत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी मानू नये.\nकाल काय लिहावं सुचत नव्हतं. त्यावेळी माझ्या कवितेनेच मला प्रेरणा दिली. ती प्रेरणाच आजची कविता \"कविता हृदयात वसणारी\"\nप्रतिमा: कृष्णमोहिनी प्रतिमा ब्लॉगसंग्रहातून\nमी कविता तुझ्या हृदयात वसणारी\nकॉपीराईट: या ब्लॉग वरील सर्व कविता व लेख यांचे सर्वाधिकार ब्लॉग लेखिकेकडे सुरक्षित. या ब्लॉगवरील कुठलाही कन्टेन्ट इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट माध्यमात पुनर्प्रकाशित करण्यापूर्वी लेखिकेची लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे. ©️ मोहिनी पुराणिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-18T11:00:13Z", "digest": "sha1:4HHRB5CZJKXUCBP2V2APSLHFKC5M7NG3", "length": 15167, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "रहाटणीतील लिटिल फ्लावर नर्सरी स्कूलमध्ये रंगला पालखी सोहळा - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे…\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची…\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Chinchwad रहाटणीतील लिटिल फ्लावर नर्सरी स्कूलमध्ये रंगला पालखी सोहळा\nरहाटणीतील लिटिल फ्लावर नर्सरी स्कूलमध्ये रंगला पालखी सोहळा\nचिंचवड, दि. २५ (पीसीबी) – रहाटणी येथील लिटिल फ्लावर नर्सरी स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्ञानोबा माऊली…तुकारामच्या जयघोषाने परिसर आनंदी व भक्तिमय झाला होता.\nविद्यार्थी वारकऱ्यांच्या पेहरावात या भक्ती सोहळ्यात सहभागी झाले होते. वारकरी व विठ्ठल रुक्मिणीचा वेष परिधान केलेले चिमुकले लक्ष वेधून घेत होते. गळ्यात तुळशी माळ, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ, मृदुंग तर मुलीच्या डोक्यावर तुळशी वृंदावन व मुखातून ज्ञानबा तुकारामांच्या नावाचा जयघोष यामुळे शाळेचा सर्व परिसर भक्तिमय झाला होता.\nमुख्याध्यापिका अनिता जांभळे यांच्या हस्ते ज्ञानोबा माऊली व तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नीता सोनवणे, शिल्पा पंडित, वैशाली चौधरी, सुरेखा गायकवाड, शीला झोडगे, उज्वला ढवळे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.\nPrevious articleमुख्यमंत्री, मंत्र्यांच्या चिथावणीखोर विधानामुळे मराठा आंदोलन चिघळले – शरद पवार\nNext articleआता लाच देणेही गुन्हा; लोकसभेत विधेयकाला मंजुरी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे पोस्टर\nपिंपळेगुरवमध्ये रविवारी पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त स्नेहमेळाव्याचे आयोजन\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nसनातन संस्थेची विघातक कार्यपध्दती मला आधीच समजली होती – पृथ्वीराज चव्हाण\nमहाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्रित होऊ शकते – एकनाथ खडसे\nचार राज्यांसह लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका डिसेंबरमध्ये घेण्यास सक्षम – ओ.पी. रावत\nकायद्यात दुरूस्ती केल्यास लोकसभा, विधानसभा एकत्रित निवडणुका शक्य – मुख्य निवडणूक...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपिंपळेनिलख येथील इंदुमती कामठे यांचे निधन\n…अखेर खाकीतली माणुसकी जागी झाली; आजींच्या चोरी झालेल्या पाटल्या पोलिसांनी स्व;खर्चाने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2010/11/08/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-18T10:52:02Z", "digest": "sha1:WE2FL4SXGJ32BJE5LFTU4MZHSCB6PBYX", "length": 66322, "nlines": 697, "source_domain": "kayvatelte.com", "title": "चिरंजीव बाबांना…. | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← आकाश कंदील.. पुन्हा एकदा..\nकाल सकाळी उठल्यावर तुम्हाला झोपलेले पाहीले, वयोमानामुळे कृश झालेला ८५ च्या आसपास वय असलेला देह, अगदी सडपातळ शरीरयष्टी, बरेच दात पडल्यामुळे खपाटी गेलेले गाल, आणि बंद असल्याने खोल गेलेले डोळे- हे सगळं पाहीलं आणि मला गलबलून आलं. आयुष्यात आजपर्यंत कधी वाटली नसेल इतकी आत्मियता एकदम दाटून आली- थोडं भरून आलं, नक्की कशामुळे हे माहीत नाही.तुमचा थकलेला चेहेरा पाहून मनात कालवाकालव झाली.\nखरं तर तुमचे वय मोठे, मी तुम्हाला तीर्थरूप लिहायला हवे पण, तुमचे छत्र कायम डोक्यावर रहावे असे वाटले, म्हणजेच त्यासाठी तुम्ही ’चिरंजीव’ रहायला हवे असे मनात आले म्हणून हा असा मायना…\nआज अगदी खरं खरं लिहितोय- तुमची साधी राहणी मला लाजिरवाणी वाटायची मित्रा मधे. सगळ्यांचे वडील जेंव्हा पॅंट शर्ट वापरायचे, तेंव्हा तुमचा साधा धोतर आणि शर्ट घातलेले पाहिले की मला उगीच कमीपणा वाटायचा- आणि खरं सांगायचं तर आपले वडील असे कपडे का घालतात म्हणून मित्रांसमोर लाज पण वाटायची. त्या लहान वयात कपडे सगळ्यात महत्वाचे, आणि त्यावरून समाजात तुमचे स्थान तयार होत असते, असा एक समज झाला होता हे तर कारण होतेच. बरं इतर मुलं मित्र वगैरे आपल्या सारखीच मध्यम वर्गीयांचीच, वडीलांच्या पॅंट्स आल्टर करून त्याच्या हाफ पॅंट बनवून घालायचे, आणि तुम्ही पॅंट न वापरल्याने मला त्या मिळायच्या नाहीत- म्हणून असेल कदाचित. तुमच्या त्या साध्या कपड्या आड दडलेलं तुमचं मन मला कधी ओळखता आलं नाही.\nलहान वयात वडील गेल्याने अंगावर पडलेल्या जबाबदारीने तुम्हाला अकाली ’मोठं’ केलं होतं का वडलांचा झालेला मृत्यु आणि आकस्मिकपणे पडलेली भाऊ आणि बहिणींची जबाबदारी- कदाचित स्वतःच्या बहिणींचे लग्न जुळवताना आलेला कडू अनुभव, गाठीशी असल्यामुळे तुम्ही लोकांकडून एकही पैसा न घेता लग्न जुळवण्यासाठी केलेली मदत, स्थळं सुचवणे, आणि हा असा लग्न जुळवण्याचा घेतलेला वसा , आणि त्यासाठी प्रसंगी स्वतःची पदरमोड करून लोकांना केलेली मदत…..त्यानिमित्त घरी येणारे लोकं… यांचा आम्हाला खूप राग यायचा. इतरांकडे फक्त त्यांचे नातेवाईक पाहुणे येतात, पण आपल्याकडे हे असे लोकं (ज्यांच्याशी कुठलाही नाते संबंध नाही असे)का म्हणून येतात पाहुणे म्हणून वडलांचा झालेला मृत्यु आणि आकस्मिकपणे पडलेली भाऊ आणि बहिणींची जबाबदारी- कदाचित स्वतःच्या बहिणींचे लग्न जुळवताना आलेला कडू अनुभव, गाठीशी असल्यामुळे तुम्ही लोकांकडून एकही पैसा न घेता लग्न जुळवण्यासाठी केलेली मदत, स्थळं सुचवणे, आणि हा असा लग्न जुळवण्याचा घेतलेला वसा , आणि त्यासाठी प्रसंगी स्वतःची पदरमोड करून लोकांना केलेली मदत…..त्यानिमित्त घरी येणारे लोकं… यांचा आम्हाला खूप राग यायचा. इतरांकडे फक्त त्यांचे नातेवाईक पाहुणे येतात, पण आपल्याकडे हे असे लोकं (ज्यांच्याशी कुठलाही नाते संबंध नाही असे)का म्हणून येतात पाहुणे म्हणून आमच्या आयुष्यातल्या प्रायव्ह्सी वर हे येणारे लोकं आक्रमण करताहेत असे वाटायचे.\nशासनाचे ’वर्ग एकचे’ (Claas I)अधिकारी होता तुम्ही पण स्वतःसाठी पैसा खर्च करणे कधीच मान्य नव्हते. नेहेमी अगदी फाटेपर्यंत वापरलेल्या चप्पल, आणि धोतर कुर्ता, असा वेश. बरोबरच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी स्कुटर घेतली होती, घरात फ्रिझ वगैरे चैनीच्या समजल्या जाणाऱ्या वस्तू घेतल्या होत्या, पण तुम्ही मात्र आम्ही कितीही मागे लागलो, तरी कधीच ह्या गोष्टींसाठी खर्च केला नाही. स्वतःच्या गरजा अगदी कमीत कमी ठेऊन उरलेल्या पैशातून समाजाचे काहीतरी देणं लागतो, म्हणून केलेले एखाद्या दूरच्या नातेवाईक असलेल्या बहिणीचे लग्न, किंवा परगावाहून कोणी मुलगी दाखवायला आणली, तर तो कार्यक्रम पण आपल्याच घरी करायचे- असो, परंतु हे सगळं पाहिले की आम्ही चिडून जायचो. तेंव्हा नेमकं हे विसरायचो, की आमच्या नेहेमीच्या गरजांना तुम्ही कधीच कमी पडू दिले नाही- विनाकारण तुमचा राग करत रहायचो..\nघरी तुमच्याकडे येणारा माणूस कितीही मोठा असला तरीही तुम्हाला नमस्कार करायचा, आणि ते पाहून बरं वाटण्या ऐवजी राग यायचा. वाटायचं, की तुम्ही हे जे काही समाज कार्य करताय, ते केवळ लोकांना दाखवायला, आणि समाजातली प्रतिमा उजळ रहावी म्हणून. पण लोकं तुम्हाला जे नमस्कार करतात ते कृतज्ञ ते पोटी, आणि त्यांच्या मनात तुमच्याबद्दल असलेल्या माना पोटी, ही गोष्ट समजायला इतकी वर्ष का जावी लागावी हेच समजत नाही\nतुम्ही कोणाकडून कधी स्थळं सुचवायला किंवा पत्रिका पाहायला पैसा घेतला नाही याचा हा परिणाम म्हणजे प्रत्येकाशी एक वेगळेच भावनिक नाते तयार व्हायचे तुमचे- जे आम्हाला कधीच समजले नाहीयेणारा प्रत्येकच माणूस तुमच्या रुपात, वडील , मोठा भाऊ, किंवा एखाद्या मान्यवराला पहायचा . स्थळं सांगायला , पत्रिकेला एकदा पैसे घेतले की मालक – नोकर नाते तयार होते, आणि पैसे घेतले नाही की ’उपकाराचे नातं”- पण हे जे ’उपकाराचे नातं”तयार व्हायचे ते तसे जाणवू न देण्याचा मोठेपणा पण तुमच्या मधे आहे हे नक्की. एखादा नेता असो, किंवा दुसरा कोणी सा्धा माणूस असो, सगळ्यांशी एकाच तऱ्हेने वागण्याची तुमची पद्धत पण मला नेहेमीच विचित्र वाटायची.\nया व्यतिरिक्त पत्रिका पहाणे हा छंद होताच. दररोज सकाळी न चुकता गुरुचरीत्राचा अध्याय वाचायचा, आणि मी जे सांगतो ते मी नाही, श्री गुरुंची कृपा म्हणून खरं निघतं ही श्रद्धा- ज्योतिष्य पहाणे हा व्यवसाय नाही, तर एक छंद आहे, म्हणून जवळपास ५६ वर्ष या छंदाची केलेली जोपासना.. मला नेहेमी वाटायचं , की तुम्ही पत्रिका पहाता, भविष्य सांगता, मग पैसे घ्यायला काय हरकत आहे पण या छंदाकडे जोडधंदा म्हणून न पहाता, केवळ छंद म्हणूनच पाहिले.. आणि त्यामुळे तुम्ही जी गुडविल कमावली आहे तिचे महत्त्व मला आज तुमच्या बरोबर रस्त्याने जातांना कोणीतरी भेटलेला माणूस रस्त्यावर तुम्हाला वाकून नमस्कार करतो तेंव्हा लक्षात येते.\nसंस्कृतचा प्रचंड अभ्यास, रुद्र, सुक्त,ऋचा आणि इतर बरंच काही मुखोद्गत असल्याचा कधी वृथा अभिमान कधीच दाखवला नाही. पुजा सांगत असलेल्या पंडीतजींना तुमच्या पेक्षा जास्त मला माहीत आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करतांना तुम्ही कधीच दिसला नाहीत- आणि तुमचे हे गुण कधीच लक्षात आले नाहीत. कदाचित त्या गुरुजींचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे, म्हणून त्यांच्या चुका वगैरे दाखवण्याचे तुम्ही टाळत असाल, हे आज लक्षात येतंय.\nपतंग उडवायला म्हणून घरचे पाच रुपये चोरून पतंग आणली, आणि तेंव्हा छत्रीने मार खाल्ला होता ती आठवण, आणि नंतर कधीच पैसे चोरायचे नाहीत, अशी देवासमोर बसून घेतलेली शपथ, अजूनही आठवणीत आहे. पण त्या प्रसंगा व्यतिरिक्त कधीच मार खाल्ल्याचे लक्षात नाही.\nआजी असतांना , ती बाहेरच्या खोलीत झोपलेली असतांना, जेंव्हा न्यायमूर्ती …. आले होते, तेंव्हा आजीला सोफ्यावरून न उठवता, खाली जमिनीवर सतरंजी टाकुन बसलेले – आणि त्यांनाही बसवलेले जेंव्हा तुम्हाला पाहीले, तेंव्हा मात्र कितीही मोठा माणूस घरी आला, तरी तो आईपेक्षा मोठा नसतो ही गोष्ट मात्र अगदी पक्की कोरल्या गेली मनावर.\nलहानपणापासून जवळपास सगळेच लोकं ” अमुक अमुक चा मुलगा” म्हणूनच ओळखायचे. का कोणास ठाऊक पण त्यामधे खूप कमीपणा वाटायचा- स्वतःचे काही अस्तित्वच नाही असे वाटायचे. पण आज मात्र लक्षात येतंय की माझं अस्तित्व जे आहे , ते केवळ तुमच्याच मुळे, आणि म्हणूनच आज तुमचा मुलगा म्हणवून घ्यायला अभिमान वाटतो .आता या परमेश्वराकडे एकच मागणे आहे की ” तुम्ही चिरंजीव व्हा, आणि असेच संस्कार माझ्या मुलांवर करण्याची पण शक्ती मिळू दे म्हणून आशीर्वाद द्या..”\n← आकाश कंदील.. पुन्हा एकदा..\n93 Responses to चिरंजीव बाबांना….\nत्या एका कुलकर्णींनी (डॉ.सलील) ’दमलेल्या बाबाची कहाणी’ सांगून रडवलं आणि आता हे दुसरे कुलकर्णी (महेंद्र) तस्साच काळजाला हात घालत आहेत… आवरा….. हे असं सणासुदीचं लोकांचे अश्रू काढायला काय बरं वाटतं का कुलकर्णी\nबाकी, मला वाटतंय तुम्ही थोड्याफार फरकाने माझ्यासारख्या अनेक मध्यमवर्गीय लोकांच्याच मनातलं लिहीलंय… मला सुद्धा हे सर्व माझ्या बाबांविषयी कधीतरी बोलायचंय, लिहायंचय, … पण काय आडवं येत कळत नाही…. त्यांच्याशी असा मनःपुर्वक, भरभरून संवाद कित्येक वर्षाय मी साधलेला नाहीये हो.. अशी काय अदृश्य भिंत आमच्या दोघात आहे मी त्यांच्या नजरेत नजर मिसळून एकदाही मोठ्या प्रेमाने बोलू शकलेलो नाही. नुसती माया पोटात आणि मनात असून काय उपयोग मी त्यांच्या नजरेत नजर मिसळून एकदाही मोठ्या प्रेमाने बोलू शकलेलो नाही. नुसती माया पोटात आणि मनात असून काय उपयोग ते ओठावर एकदातरी येईल का ते ओठावर एकदातरी येईल का तुमच्या पोस्टने माझी आजची झोप खाल्ली हे खरे…. भिजलेल्या उशीचे पातक तुमच्या माथी……….\nबऱ्याच गोष्टी मनात घर करून होत्या, त्या मोकळ्या केल्या. एक वेगळंच बॅरीयर असतं मधे. कदाचित जनरेशन गॅप\nदोघांपैकी एकाने तरी पुढाकार घ्यायला हवा म्हणजेच संवाद सुरु होईल. एकदा विचारांची देवाण घेवाण सुरु झाली की मग सगळं सोप्पं होऊन जाईल.\n१००% खरंय विक्रांत. माझ्या मनात सुद्धा हेच उमटलं. मला बाबांची कितीवेळा अशी आठवण येते आणि डोळ्यासमोरचं सगळं धुसर होतं. कितीवेळा वाटतं की त्यांनी एकटं राहण्यापेक्षा आमच्याबरोबर इथे रहायला यावं. आम्हालाच आधार होईल. पण मुलीकडे मी राहून काय करू पुणं सोडून मी काय करू पुणं सोडून मी काय करू मला समजत नाही त्यांना हे कसं सांगू की मला त्यांचा सहवास हवा आहे. शेवटी फोनवर बोलून समाधान मानते. पण मनातला कढ बाहेर येतोच.\nमहेंद्रजी, सर्दीमुळे आधीच डोकं जड झालेलं आणि त्यात ह्या पोस्टने मनही जड करून टाकलंत तुम्ही. किती मनकवडे आहात हो.\nमला खूप लिहावंसं वाटतंय..पण जमेलसं वाटत नाही\nआजचा दिवस कसा जाणार ऑफिसातला कुणास ठाऊक\nकाही गोष्टी खूप दिवस मनात साचून असतात. त्यांचा निचरा झालेला बरा असतो, म्हणून हा लेख..\nनिशब्ध आहे मी काका.. 😦\nमुलांच्या मनाची घालमेल या बांबा विषयीच्या लेखात दिसली आहे.\nब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार.\nमाणसं जपणं महत्वाच, आणि आपल्या जनरेशन मधे हीच गोष्ट आपण गमावून बसलेलो आहोत. मला पण जाणवते ही गोष्टं.\nब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार.\nवडिलांची किंमत खरच आपल्याला नाही कळत, किती दुर्दैवी आहोत आपण\nयाची जाणिव लवकर होणे महत्वाचे आहे .. बस्स्स.. एवढंच..\nअगदी मनातल लिहिलत. बाबां बद्दल खूप काही वाटत पण लिहता मात्र काहीच येत नाही.\nबऱ्याच गोष्टी ज्या लिहिता येत नाहीत, त्या फक्त अनुभवायच्या आणि जर आपलं कुठे चुकत असेल तर त्या चुका दुरुस्त करायच्या एवढं आपल्या हातात नक्की आहे.\nखूप टची झाल्ये पोस्ट.\nएकटं असताना आई, बाबांविषयी विचार केला की लहानपणीच्या आपल्या काही काही बोलण्याबद्दल, कृतींबद्दल खूप गिल्टी वाटते.\nमनातलं लिहिलस….. माझं लिहायचं राहून गेलं , ते तू पुर्ण केलंस..धन्यवाद.\nयाची जाणिव झाली की त्याप्रमाणे आपले वागणे आपण सुधारू शकतो ..\nबोलायला किंवा लिहायला जमत नाही आहे काका…एक्दम काळजात हात घातलास…खरच आईची माया, प्रेम दिसते नव्हे ती ग्रुहीत धरलेली असते…पण वडीलांचे प्रेम काहि औरच…\nधन्यवाद.. लिहायला सुरु कर की जमेल आपोआप\nछान झालीये पोस्ट …\nनि:शब्द आहे मी….माहित नाही का…पण मला आई आणि बाबा यांच्याबद्दल सलग लिहिता येत नाही….त्यांनी आमच्यासाठी खालेल्या खस्ता आठवल्या की फक्त भरून येत आणि अक्षर धूसर होतात..अगदी आत्ता झालीत तशीच……\nखरं आहे. फार कठीण आहे लिहिणं.. जे काही मनात आहे ते सगळं तसंच उतरेल याची गॅरंटी नाही.\nअवश्य दाखवीन पत्रिका. संस्कृतमधली पत्रिका पाहून त्यांना नक्कीच बरं वाटेल.. मनःपुर्वक धन्यवाद.\nखूप छान उतरल्या आहेत भावना……\nआई, बाबा……हे विषय अगदी काळजालाच हात घालतात ना रे……\nअगदी खरं आहे. सकाळी पाच वाजता उठलो होतो, आणि त्यांना झोपलेलं पाहिलं, आणि अवध्या तीस मिनिटात टाइप केलंय हे पोस्ट, जे काही मनात येईल ते टाइप करत गेलो, पण पोस्ट करण्याची हिम्मत दोन दिवस झाली नाही- वाटलं खूप पर्सनल आहे , पोस्ट करू नये..पण ;लिहिलं..\nतुम्ही नेहेमी वाचता हे माहीत आहे, पण या वेळी आवर्जून कॉमेंट दिलीत त्याबद्दल आभार. काही नात्यांच्या बाबतीत आपण थोडं जास्त सेन्सिटीव्ह असतोच…\nआठवणीना पारभिजून गेलो परत आपण भूतकाळाकडे नेले.सुदर अप्रतिम ,\nब्लॉग वर स्वागत, आणि प्रतीक्रियेसाठी आभार..\nमी आईच्या खूप जवळ आहे. बाबांनी कधी कशाला विरोध केला नाही की पाय ओढले नाहीत तरी देखील त्यांच्याशी आई इतके स्पष्ट बोलता येत नाही. पण कुठे तरी काहीतरी साचून राहीले आहे हे नक्की. इंजिनियरिंग केल्यानंतर ४ महिने जॉब नव्हता. बाबादेखील तोपर्यंत रिटायर झाले होते. त्यावेळी एकदा जॉबवरुन फोनवर जोरदार रडू कोसळले होते तेंव्हा बाबा “अरे रडतोस कशाला मी आहे ना” असे म्हणाले होते ते आज ही लक्षात आहे. आज तुमच्यामुळे खूप काही आठवतय.\nअशा खूप गोष्टी मनात आहेत, ज्या इथे लिहिलेल्या नाहीत.. जरी बोलणं नसलं, अगदी अघळपघळ गप्पा नसल्या, तरी ” मी तुझ्या पाठीशी आहे” एवढी भावना पण पुरेशी असते या जगात उभं रहायला.\nएक गोष्ट मला पटते, ती म्हणजे – वडीलांचे मन समजायला स्वतःची मुलं मोठी व्हायला लागतात, तोवर काही निटसं समजत नाही बघ……\nखूप खूप मस्त काका साधारणत: आपण मोठे झाल्यावरच ह्या गोष्टी आपल्याला जाणवतात. वयामुळे असेल कदाचित साधारणत: आपण मोठे झाल्यावरच ह्या गोष्टी आपल्याला जाणवतात. वयामुळे असेल कदाचित पण ही जाणीव त्यांच्यापर्यंत पोहोचवणे फार फार आवश्यक असते. जशी आपल्या बाजूने ही खंत असते की, आत्ता ह्या गोष्टी जाणवल्या तसेच ही खंत त्यांनासुद्धा असते. मुलाने हे नुसते बोलून दाखविले ना तरी त्यांना अगदी कृतार्थ वाटते. बाबा आणि आजोबा ह्या दोन्ही व्यक्तींच्या जवळ असल्याने मला दोन्ही बाजू जवळून पाहता आल्या 🙂\nअगदी खरं आहे . पण बरेचदा कळतं की बोलून दाखवावं, पण जमत नाही\nबाबांशी अगदी खूप बोलावंसं वाटतं..\nअजूनही इच्छा होते त्यांना मिठी मारून भेटायची.\nत्यांना न कळत्या वयात दिलेले मनस्ताप आठवतात.\nत्यांना उद्देशून मी माज आल्याच्या भरात हलकटासारखे अपमानास्पद बोललेलं ही आठवतं. ते शब्द कायमचे वार करुन गेले असणार त्यांच्यावर.\nपण ते तर माझ्या तेराव्या वर्षीच गेले.\nआज असते तर त्याची माफी मागायचं धाडस केलं असतं.\nपण गेली संधी फार पूर्वीच..\nमनाला खोल टच केलंत महेन्द्रजी..बरं झालं उशीरा वाचली पोस्ट..दिवाळीत वाचली असती तर फार बेचैनीत गेली असती दिवाळी ..\nबाय द वे..सुंदरच आहे पोस्ट..\nमला वाटतं की प्रत्येकाच्याच आयुष्यात अशा काही तरी घटना घडत असतात- तुमचे एकट्याचे काही एक्सेप्शन नाही. कदाचित या गोष्टीला किंवा अशा प्रकारच्या वादविवादाला जनरेशन गॅप हे कारण असेल का\nकाही लोकं अशा गोष्टी आपल्या बाबतीत घडल्यच नाहीत म्हणून त्यावर पांघरूण घालतात, तर काही लोकं जे जास्त सेन्सिटीव्ह असतात ते पश्चाताप करतात..\nएक बाकी आहेच, की काहीही झाले तरीही वडील नेहेमीच मुलांचे अपराध पोटात घालून त्याचे अभिष्ट चिंततात..\nआभार.. बरेच दिवसापासून मनात होत्या ह्या गोष्टी.\n तुम्हाला आणि तुमच्या वडलांना सलाम\nधन्यवाद. बऱ्याच गोष्टींबद्दल एक गिल्टीक~न्शस असतो त्यातलीच ही एक.\nखूप खूप मस्त काका\nधन्यवाद विक्रम.. पण खरं सांगतो जे लिहिलंय ते मला स्वतःलाच वाचतांना थोडं अवघडल्यासारखं झालं होतं..\nकाय कुणास ठाऊक पण आज काल बाबांवरील काहीही लिखाण वाचलं कि लगेच भरुन येतं..\nनका हो असं लिहित जाउ…\nपण तरी… सगळं मनातलं बोल्लात बघा…\nभावनांना खरे खरे शब्द मिळाले, आणि स्वतःचा मुखवटा बाजूला ठेउन लिहिलंय. आता जेंव्हा मला वडीलांची लाज वाटायची हे लिहिलं, तेंव्हा स्वतःचीच लाज वाटली. असे अनेक प्रसंग होते, पण सगळेच इथे लिहिले नाहीत.\nमुलगा वडील हे नात मुक असतं.. हे तर वरच्या सगळ्याच प्रतिक्रियातून दिसून आलं. मला वाटायचं की मी एकटाच असा वागलो, पण बहूतेक प्रत्येकाच्याच आयुष्यात असे काही जिवघेण्या आठव्णी आहेतच..\nमुलींचे आणि बाबांचे नाते जरा वेगळेच असते ह्याच्याशी सहमत आहे मी पण..\nनमस्कार महेंद्रजी. मी तुमच्या ब्लॉग चा नियमित वाचक आहे, पण प्रतिक्रिया आज प्रथमच देत आहे. नितांत सुंदर विचार लिहिले आहेत आपण. थोड्या फार फरकाने खूप जणांना वाटते पण कागदावर उतरवणे फक्त आपल्या सारख्या काहीजणांना जमते. धन्यवाद .\nब्लॉग वर स्वागत, आणि प्रतिक्रियेसाठी आभार..\nमनात खुप भावना आहेत पण शब्द नाहीत…डिग्री पास आउट झाल्यानंतर सिविल मध्ये रिसेशन होत त्यामुळे मनासारखा जॉब मिळत नव्हता…त्याकाळात खुप फ़्रस्ट्रेट झालो होतो…एके रविवारी वैतागुन गावी गेलो….संध्याकाळी जेवण झाल्यावर त्यांच्या मांडीवर डोक ठेवुन मनोसक्त रडुन घेतल होत…त्यावेळी त्यांचा डोक्यावर असणारा हात खुप आधार देउन गेला…आज पण कधी कधी खुप फ़्रस्ट्रेट होत तेव्हा त्यांच्या मांडीवर डोक ठेवल की बस्स…मनाला खुप बळ मिळत.\nअसे संबंध असणं खरंच भाग्याचं लक्षण आहे.. शुभेच्छा..\nमला वाट्तं ते दोन्ही कंपार्टमेंट्स वॉटरटाइट ठेवत असायचे. ऑफिस – आणि घर. तसेच तेंव्हा सेल फोन, लॅप्टॉप, वगैरे इष्टापत्ती नव्हत्या, त्यामुळे पण एकदा घरी आले की ऑफिसचे काम विसरणे सोपे व्हायचे, ऑफिशिअल कामासाठी फोन वगैरे बंद असायचे. जरी एखादा फोन आला तरी काम तर ओफिसमधे गेल्यावरच होणार, मग घरी फक्त ऐकुन नंतर सोमवारी करतो म्हणायचे.\nआपल्या बाबतीत तोच खर इश्य़ु आहे, मी कालपासून सारखा इ मेल आणि फोन वर आहे, म्हणजे घरी असूनही ऑफिसचे काम सुरु आहेच. लॅप टॉप असल्याने, आणि इ आर पी असल्याने घरी पण काही फारसा आराम नसतोच. घरी पण काम सुरु असतंच.. चालायचंच, कालाय तस्मै नमः म्हणायचंझालं..\nउद्या पासून एक आठवडा टुर वर जायचंय, आणि आज सकाळ्पासून सारखा कामातच बिझी आहे..\nकाका, मनाला भिडेल अस लिहिलय तुम्ही. बाबा, म्हणजे वीक पॉइण्ट आहे माझा. थोड्या फार फरकाने बहुतेक लोकांच्या मनात असाच काहीतरी असणार आहे पण म्हणतात ना जेनरेशन गॅप त्यामुळे कदाचित मन की बात मन में ही रह गयी. आपल्या आई वडिलांनी किती खस्ता खाल्या आपल्यासाठी ते आठवून गलबलुन येत. माणसाची किंमत तो असताना नाही कळत तो गेल्यावरच कळते, पण ज्याला आपल्या मनातील भावना खरच आई वडिलांपर्यंत पोहोचवायच्या असतील त्यानी वेळ दवडू नये, अन् त्यासाठी मदर्स डे, फादर्स डे ची वाट पाहु नये. धन्यवाद काका.\nखरंय.. मान्य.. हा लेख वाचून काहीलोकांनी जरी आपलं मन मोकळं केलं तरी खूप मिळवलं, आणि या लेखाणाचे चिज झाले असे समजेन मी.\nतुमचे वडील कल्पवृक्ष आहेत आणि तुम्ही अर्थातच नशीबवान आहात, तुमच्या बाबांना मानाचा मुजरा \nमहेंद्रजी ही पोस्ट वाचली तेव्हा मी भारतातच होते…. मी पोस्ट वाचत असताना माझे बाबा माझ्या मुलांबरोबर अंगणात फटाके उडवत होते….. किती वर्षानंतर फटाके खरेदी झाली असेल माहित नाही, पण माझ्या लग्नानंतर गेल्या दहा वर्षात ईतक्या उत्साहातली ही त्यांची दिवाळी आणि मुलांबरोबरचं त्यांच खेळणं पाहून तुमच्या पोस्टचं चिरंजीव बाबा नाव सार्थ वाटलं, माझ्याही मनात अश्याच काही भावना होत्या तेव्हा\nएक अप्रतिम पोस्ट ईतकचं म्हणेन आत्ता…..\nस्टार माझा तर्फे पहिल्या सहा मध्ये आल्या बद्दल मनःपुर्वक अभिनंदन. आत्ताच फोन केला होता, पण तो तुझ्या आईने उचलला. माझ्याकडे तुझा तिकडचा नंबर नसल्याने बोलता आले नाही.\nकालच माझ्या बाबांशी बोलणं झालं< माझ्या एका आतेभावाने त्यांना हे पोस्ट वाचून दाखवले. ्बोलतांना खूप गहीवरून आलं होतं त्यांना… पण छान वाटलं..\nअगदी भरुन आल हे वाचल्यावर…..\nतुझी ही पोस्ट आली त्याच्या आदल्याच रात्री आपण बोललो होतो… दोघेही नाशिकलाच होतो… वाचून इतकी रडले… काहीच लिहीले गेले नाही त्यादिवशी. आज पुन्हा वाचली… मन, डोळे सारेच कसे भरून आलेय…. कारणे अनेक आहेतच. काही ताजी काही जुनी…आजचा दिवस सारखे हेच घोळणार मनात. महेंद्र, फार फार हळवं केलस रे….\nब्लॉग वर स्वागत आणि लवकर लक्षात येणं महत्वाचं. बरेचदा एखादी गोष्ट रिअलाइझ करायला खूप वेळ होतो..\nमनापासून लिहिले तुम्ही, मला खूप आवडले. मी नेहमीच तुमच्या पोस्त वाचतो.पण आज बर्याच दिवसा नंतर मन भरून आले. आज आपले जगणे एवढे यांत्रिक झाले आहे कि बाबांशी प्रेमाने दोन शब्द बोलायला व मन मोकळे करायलाही जमत नाही. एकाकांतात सगळ्या लहानपणीच्या गोष्टी आठवतात- त्यांचे प्रेम, माया, धडपड सगळे सगळे आठवते पण का कुणास ठाऊक ते त्यांचासमोर व्यक्त करायला घाबरतो. आई-वडील लहान पानापासून आपल्याला देतच असतात व त्यांनी देतच राहावे हि आपली सर्वसाधारण इच्छा असते. पण आपणही त्याचे ऋणी आहोत आणि ही परतफेड ह्याच जन्मात करायची आहे हे बहुतेकजन विसरतात.\nब्लॉग वर स्वागत, प्रतिक्रिया तर अगदी मनाला स्पर्शुन गेली, आणि लिहिल्याचे सार्थक झाले असे वाटले. धन्यवाद..\nमला वाटतं की ही गोष्ट जी तुम्ही लिहिली आहे, ती लवकर लक्षात यायला हवी आपल्या- बरेचदा आपल्याला काय वाट्तं त्यांच्याबद्दल हे सांगायचं राहून जात, बरेचदा हिम्मत होत नाही समोर बोलायची- कारण संस्काराचे परीणाम असतात ते. प्रत्येक गोष्ट आईच्या माध्यमातून बाबांपर्यंत पोहोचवयाची आपली सवय असल्याने आपण प्रत्यक्ष बोलायला लागलो की अडखळतोच.. असो..\nअरविंद दिगंबर हंबर्डे says:\nहोत काय कि लहानपणी आपण खेळात, मित्रात गुंगलेले असतो. आई बाबा समजण्या इतकी अक्कलही नसते. हळुहळू आई बाबा समजत जातात. पण खूप वेळा मनातल सगळ बोलता येत नाही. अर्थात आपल्या वागण्यातून त्याना ते नक्कीच कळ्त.\nसगळ छान चालू असत आणि एके दिवशी ते हिरावले जातात. आणि अशावेळी बहीण भावाच नात कामी येत. बहीण आईची माया देते. भाऊ बाबांची उणीव भासु देत नाही.\n…………………………… देव खूप दयाळू आहे.\nप्रतिक्रियेसाठी आभार. आणि ब्लॉग वर स्वागत.. बहीण भावंडांच नातं हा एक दिलासा म्हणता येईल. पण जेंव्हा वडीलांबद्दल खरी जाणीव होते तेंव्हा समजतं की हे आधीच समजायला हवं होतं आपलाला. बहिण भावंडाचं नातं अर्थात थोडा दिलासा तर देऊनच जातं.\nलवकर सांगा.. नाहीतर नंतर पश्चाताप होत राहील, की आपण का सांगितलं नाही म्हणून\nफ़ारच सही, ह्याच्या अनुषंघाने…. एक ऋचा आठवली….\nनेमके सुक्त किंवा संस्कृत आठवत नाही पण भावार्थ काहीसा असा आहे\n“माता ही जमीनी प्रमाणे असते…. किती ही कुदळी घातल्या तरी वात्सल्याचे मोतीच देते\nपण पिता हा आकाशा समान असतो… त्याच्यापर्यंत हात जरी पोहोचला तरी आयुष्य सफ़ल झाले\nपिता हा हाच प्राणवायु असतो ज्याचे अंतःकरण तुमच्या सहीत तुमच्या धरती स्वरुपी माते ला सहज कवेत घेण्याइतके विशाल असते”\nका काय माहीत पण एका विशिष्ट वया नंतर मुलाचे अन वडीलांचे बोलणॆ फ़ार कमी होऊन जाते….\nअगदी काही इश्यु नसले तरीही…. का कोण जाणॆ….\nतसेच अजुन एक ऑब्झर्वेशन…\nमुली कंपॅरेटिव्ह्ली बाबा च्या जास्त लाड्क्या असतात अन जवळ असतात… अन मुले आईच्या….\nतुम्ही हसाल पण अजुन ही घरी गेलो की एकदा तरी लिटरली आई चा पदर धरुन मागे मागे हिंडल्या शिवाय\nमाझी ट्रीप सार्थकी लागतच नाही घरची\nआईचा लाडका असतोच मुलगा नेहेमी. पण वडीलांशी संवाद कमी होतो हे नक्की का ते सांगता येत नाही..\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nसिक्रेट मेसेज कसा पाठवायचा\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8.html", "date_download": "2018-08-18T11:08:11Z", "digest": "sha1:MOZ25DG3VJOGJTZRIWNGAECIQXNXGATD", "length": 25410, "nlines": 292, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | गोविंदराव पानसरे यांचे निधन", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, महाराष्ट्र » गोविंदराव पानसरे यांचे निधन\nगोविंदराव पानसरे यांचे निधन\nमुंबई, [२० फेब्रुवारी] – ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, कामगार व शोषित वर्गासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे व डाव्या चळवळीचे अध्वर्यू गोविंदराव पानसरे यांचे शुक्रवारी रात्री उशिरा मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. शनिवारी सकाळी १० वाजता त्यांचे पार्थिव कोल्हापूर येथे नेण्यात येणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयात जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले.\nगोविंदराव पानसरे व त्यांची पत्नी उमा यांच्यावर गेल्या सोमवारी सकाळी कोल्हापुरात त्यांच्या घरासमोरच प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. यात पानसरे यांना तीन गोळ्या लागल्या होत्या. कोल्हापूर येथील रुग्णालयात त्यांच्यावर तातडीने दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रियांनंतर पानसरे यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, गुरुवारी त्यांच्या फुफ्फुसाला सूज आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात हलविण्याबाबत विचार सुरू होता व त्याप्रमाणे शुक्रवारी दुपारी त्यांना कोल्हापूर येथून एअर ऍम्ब्युलन्सने मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात हलविण्यात आले. पानसरे यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र, शुक्रवारी रात्री त्यांच्या फुफ्फुसात रक्तस्राव सुरू झाल्याने पुन्हा डॉक्टरांची धावपळ सुरू झाली. अथक परिश्रम करूनही डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही. रात्री उशिरा त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली.\nगोविंदराव पानसरे हे परिवर्तनवादी चळवळीतील मोठे नाव होते. विवेकवादावर भर देणारे, बुद्धिप्रामाण्य मानणारे पुरोगामी विचारवंत म्हणून त्यांची ख्याती होती. शालेय जीवनात राष्ट्र सेवादलाकडे त्यांचा ओढा होता. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने त्यांनी कामगार, शेतकरी, मजूर व असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी सातत्याने आंदोलन केले. विविध क्षेत्रातील एकूण १५ संघटना त्यांनी स्थापन केल्या होत्या. गोविंदराव पानसरे यांनी ऊस तोडणी कामगार आणि कष्टकरी स्त्रियांना न्याय मिळावा म्हणून सातत्याने संघर्ष केला. राज्य सरकारच्या गरिबांसाठी असलेल्या अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून त्यांनी विविध माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले. गोविंदराव पानसरे यांनी जवळपास २१ पुस्तके लिहिली आहेत. भाकपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे ते सदस्य होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर आज पानसरे यांचीही तशाचप्रकारे हत्या झाल्याने महाराष्ट्राला धक्का बसला आहे.\nवेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी गोविंदाव पानसरे यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकार व पणन मंत्री चंद्रकांत पाटील, सुप्रिया सुळे, खा. राजू शेट्टी, रिपाइं नेते रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवरांनी पानसरे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.\n५ हजार कोटींच्या कामांचे ई-भूमिपूजन\nनितीन गडकरींच्या निर्णयाने महाराष्ट्रातील सिंचन क्षमता वाढणार\nसुनील तटकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nसंपूर्ण राज्यातून १३ लाख ३९ हजार विद्यार्थी प्रश्‍नपत्रिका दहा मिनिटे अगोदर मिळणार पुणे, [२० फेब्रुवारी] - महाराष्ट्र राज्य माध्यमिक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-std-11-admission-122420", "date_download": "2018-08-18T10:26:38Z", "digest": "sha1:KQ5EYLEUXIBPKLA72IWIZETYNVRW6GLG", "length": 15592, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news std 11 admission शहरात अकरावीच्या 27 हजार जागा, पॉलिटेक्निक प्रवेश क्षमता 11 हजार | eSakal", "raw_content": "\nशहरात अकरावीच्या 27 हजार जागा, पॉलिटेक्निक प्रवेश क्षमता 11 हजार\nशुक्रवार, 8 जून 2018\nनाशिक : इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता पुढील शिक्षणाच्या प्रवेशाची लगबग सुरू होणार आहे. शहरातील 56 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला, विज्ञान, वाणिज्य व व्यावसायिक शिक्षणक्रम अशा सर्व मिळून 27 हजार जागा उपलब्ध आहेत. दरम्यान 21 हजार 724 विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन स्वरूपात अर्जाचा भाग एक भरला आहे. दहावीनंतर तंत्रशिक्षणाचा पर्याय असलेल्या पदविका (डिप्लोमा) करीता 27 तंत्रनिकेतनमध्ये 11 हजार 280 जागा उपलब्ध आहेत.\nगेल्या वर्षीपासून अकरावी प्रवेशासाठी महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांसाठी केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.\nनाशिक : इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता पुढील शिक्षणाच्या प्रवेशाची लगबग सुरू होणार आहे. शहरातील 56 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला, विज्ञान, वाणिज्य व व्यावसायिक शिक्षणक्रम अशा सर्व मिळून 27 हजार जागा उपलब्ध आहेत. दरम्यान 21 हजार 724 विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन स्वरूपात अर्जाचा भाग एक भरला आहे. दहावीनंतर तंत्रशिक्षणाचा पर्याय असलेल्या पदविका (डिप्लोमा) करीता 27 तंत्रनिकेतनमध्ये 11 हजार 280 जागा उपलब्ध आहेत.\nगेल्या वर्षीपासून अकरावी प्रवेशासाठी महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांसाठी केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.\nयंदा छावनी परीषदेचा भाग वघळता शहराच्या हद्दीत असलेल्या उर्वरित सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ऑनालाईन स्वरूपात प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. शहरात 56 कनिष्ठ महाविद्यालये कार्यरत असून त्यात सर्व शाखांच्या मिळून 27 हजार जागा उपलब्ध आहेत. सद्य स्थितीत शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.\nयाअंतर्गत आतापर्यंत 21 हजार 724 विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग एक भरला आहे. महाविद्यालय पसंतीक्रम, शाखा निवडीवर आधारीत अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल.\nअकरावी प्रवेशासाठी ऑनालाईन स्वरूपात सादर केलेल्या 21 हजार 724 विद्यार्थ्यांपैकी 15 हजार 736 विद्यार्थ्यांनी अर्जासाठीची आवश्‍यक पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. तर 2 हजार 103 विद्यार्थ्यांची संगणकीकृत पद्धतीने पडताळणी (ऑटो-व्हेरीफाईड) प्रक्रिया झालेली आहे. उर्वरित 3 हजार 885 विद्यार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया झालेली नाही. ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय या विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोन भरता येणार नाही.\nशहरातील प्रमुख महाविद्यालयांतील शाखानिहाय प्रवेश क्षमता-\n(अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंसर्थसहाय्य तसेच विविध माध्यमाच्या मिळून)\nमहाविद्यालयाचे नाव प्रवेश क्षमता\nनाशिकरोड बिटको 600 480 240\nभोसला महाविद्यालय 360 240 240\nसीएमसीएस 240 120 --\nबीवायके -- 960 --\nकेएसकेडब्ल्यू सिडको 480 480 240\nपंचवटी महाविद्यालय 480 240 360\nएसएमआरके 120 120 120\nपदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमाची नाशिक विभागाची स्थिती\nजिल्हा तंत्रनिकेतन उपलब्ध जागा\nMaratha Kranti Morcha : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री आंदोलन\nपुणे : मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे सोमवारपासून (ता.20) मराठा आरक्षणासाठी आणि विविध मागण्यांसाठी पुणे विभागीय आयुक्त...\n'एक धागा शौर्य' का सैनिकांसाठी जुन्नरच्या विद्यार्थ्यांनीचा अभिनव उपक्रम\nजुन्नर - सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांसाठी जुन्नरच्या शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थिनींनी 'एक धागा शौर्य'का हा अभिनव...\nटाकवे बुद्रुक - सावित्रींच्या लेकींना दुस-या टप्प्यात पंधरा सायकलींचे वाटप\nटाकवे बुद्रुक - आंदर मावळाच्या मिंडेवाडी तील ठाकरवस्ती, चावसरवस्ती, जाधववाडीतून पायपीट करीत येणा-या विद्यार्थ्यांसह सावित्रींच्या लेकींना दुस-या...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nभाषणात मोठी ताकद आहे.. : बबन साळगांवकर\nसावंतवाडी : भाषणात मोठी ताकद आहे त्याच वक्तृत्वाचा फायदा घेऊन तब्बल 23 दिवसांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे पहिल्यांदा आमदार बनले आणि त्यांनी नंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.tarunbharat.com/news/600511", "date_download": "2018-08-18T10:26:30Z", "digest": "sha1:QQRZN53VYFVOA3SQAXN57UQWS5OAYJGF", "length": 5742, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पेप्सीको इंडियाच्या उत्पन्नात 6 टक्क्यांची वाढ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » पेप्सीको इंडियाच्या उत्पन्नात 6 टक्क्यांची वाढ\nपेप्सीको इंडियाच्या उत्पन्नात 6 टक्क्यांची वाढ\nवृत्तसंस्था /नवी दिल्ली :\nपेप्सीको इंडियाला सॉलिड मिड सिंगल डिजिट ऑर्गेनिक उत्पन्नात वाढ करण्यात यश मिळाले आहे. यांच्याकरिता कंपनीकडून मायक्रोइकॉनॉमिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थान मजबूत करण्यात आले आहे. याच कारणामुळे पेप्सीको इंडियाच्या उत्पन्नात 6 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.अशी माहिती कंपनीच्या मुख्य अधिकारी इंदीरा नुई यांनी दिली आहे.\nआंतरराष्ट्रीय बाजारात चांगले यश मिळाल्यानंतर काही ठिकाणी अभियान राबवण्यात आली यामुळे उत्पन्नात वाढ होण्यास मार्ग निर्माण झालेत. यांचा वापर इतर बाजारापेठामध्ये करण्यात आला. पेप्सीको इंडियाने व्यवसायात उत्पन्नाच्या आकडय़ाचा विचार न करता जीएसटीचा दबाव कमी होत गेल्याने उत्पन्नात या तिमाहीत चांगला फायदा कमवता येणार असल्याचा अंदाजही मांडण्यात येत आहे.\nभारत आणि परदेशातील कंपन्याच्या सॉफ्ट ड्रिंक्स बाजारात घसरण दिसून आली. पण काही तज्ञांच्या मतानूसार मागील 12 आठवडय़ापासून चांगल्या उत्पन्नाचा अंदाज नोंदवण्यात आला आहे. पेप्सीकोचे अध्यक्ष अहमद शेख यांनी एका मुलाखतीत कंपनी उत्पन्न वाढवण्याकरिता काही ठराविक सकारात्मक बदल करण्यात येणार आहेत असे म्हटले आहे.\nधक्का मारून बाहेर काढल्याशिवाय शिवसेना सत्ता सोडणार नाही : नारायण राणे\nराज्यातील उपसा सिंचन योजना सोलरवर\nभाजपने मुका घेतला तरी युती होणार नाही : संजय राऊत\nखासदार हिना गावीत यांच्यावरील हल्ल्या निषेधार्थ नंदूरबार, धुळे बंद\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/nagpur-news-kahi-sukhad-news-swapnil-khade-58356", "date_download": "2018-08-18T10:31:01Z", "digest": "sha1:B7G63PDIQZR7OU57EXLS256NJOSJ3JVX", "length": 12370, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news kahi sukhad news swapnil khade ‘काय बनायचे ते लिहून ठेवा’ | eSakal", "raw_content": "\n‘काय बनायचे ते लिहून ठेवा’\nरविवार, 9 जुलै 2017\nशेषनगर (ता. हिंगणा) - ‘‘तुम्हाला आयुष्यात जे बनायचे आहे, ते आज तुम्हाला मिळत असलेल्या नोटबुकाच्या पहिल्या पानावर लिहून ठेवा आणि त्यासाठी संघर्ष करा.’’ स्वप्नील खाडे या तरुणाचे प्रेरणादायी भाषण संपताच शेषनगर येथील विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.\nशेषनगर (ता. हिंगणा) - ‘‘तुम्हाला आयुष्यात जे बनायचे आहे, ते आज तुम्हाला मिळत असलेल्या नोटबुकाच्या पहिल्या पानावर लिहून ठेवा आणि त्यासाठी संघर्ष करा.’’ स्वप्नील खाडे या तरुणाचे प्रेरणादायी भाषण संपताच शेषनगर येथील विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.\nउच्चशिक्षित तरुणाई मार्गदर्शकाच्या भूमिकेत आणि छोट्या गावातील विद्यार्थी श्रोत्यांच्या भूमिकेत, असे आगळेवगळे दृश्‍य येथे आज पाहायला मिळाले. निवृत्त कार्यकारी अभियंता शुद्धोधन बडवने यांच्या पुढाकारातून शेषनगर येथे शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम मागील सहा वर्षांपासून राबविला जातो. नागपूर येथील लोखंडे नगर येथील सुदत्त बुद्धविहारातील अभ्यासिकेतील युवक-युवती या उपक्रमाशी जुळले. त्यांनी ‘एक वही एक पेन’ हे अभियान राबवीत नोटबुक आणि पेन गोळा केले. ‘पे बॅक टू सोसायटी’ या भावनेतून त्याचे वितरण आज येथे करण्यात आले. सुमित मेश्राम, हर्षल धनविजय, सौरभ जामगाडे, हिमांशू खनखने, महेश कांबळे, नीरज पाटील, पराग गवळी, प्रिया चव्हाण, अनुराग लोहवे, भाग्यश्री पोहले, अभिषेक भगत, रितीक पळसपगार, अक्षय इंगळे, आम्रपाली आडके, यश मदनकर हे युवा या कार्यक्रमात सहभागी झाले. जयदेव खोंडे, जितेंद्र म्हैसकर, प्रमोद काळबांडे, बबनराव गोरामन, सुरेश मानवटकर आदी प्रमुख पाहुण्यांची भाषणे झाली. येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना रेवतकर आणि शिक्षिका मीनाक्षी निर्वाण यांनी आयोजनासाठी सहकार्य केले.\n'एक धागा शौर्य' का सैनिकांसाठी जुन्नरच्या विद्यार्थ्यांनीचा अभिनव उपक्रम\nजुन्नर - सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांसाठी जुन्नरच्या शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थिनींनी 'एक धागा शौर्य'का हा अभिनव...\nटाकवे बुद्रुक - सावित्रींच्या लेकींना दुस-या टप्प्यात पंधरा सायकलींचे वाटप\nटाकवे बुद्रुक - आंदर मावळाच्या मिंडेवाडी तील ठाकरवस्ती, चावसरवस्ती, जाधववाडीतून पायपीट करीत येणा-या विद्यार्थ्यांसह सावित्रींच्या लेकींना दुस-या...\nबारामती - विद्या प्रतिष्ठानच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पुरस्कार\nबारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट...\nपंकज भूसे यांचा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव\nसरळगांव - महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी होऊन दिलेल्या उद्दिष्टा पेक्षा जास्त वृक्ष लागवड करून उत्कृष्ट कामगिरी केल्याने...\nपिंपळवंडीला मानव-बिबट सहजीवन जनजागृती\nजुन्नर - पिंपळवंडी ता.जुन्नर येथे मानव व बिबट संघर्ष व सहजीवन याविषयी मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती करण्यात आली. जुन्नर वन विभाग तसेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/wari/pandharpur-wari-2017-vishwas-nangare-patil-54590", "date_download": "2018-08-18T10:48:02Z", "digest": "sha1:YSLJCKLEVZUXI3QUX2YD2RTBALMXXKHI", "length": 16245, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pandharpur Wari 2017 vishwas nangare patil विठ्ठलनाम म्हणजेच नादब्रह्माची अनुभूती | eSakal", "raw_content": "\nविठ्ठलनाम म्हणजेच नादब्रह्माची अनुभूती\n(शब्दांकन - शंकर टेमघरे)\nशुक्रवार, 23 जून 2017\nविठ्ठल या शब्दात ‘ठ’ ला ‘ठ’ असल्याने विशिष्ट प्रकारचा नादब्रह्म तयार होतो. त्यातून सकारात्मक ऊर्जा तयार होते. विठ्ठल नामात शरीर आणि मन जोडले जातात. मी चौथीला असताना आजीबरोबर पंढरीला गेलो होतो. विशेष पोलिस महानिरीक्षक झालो तेव्हा अतिशय बंदोबस्तात विठ्ठलाचे दर्शन घेतले. सुरक्षा व्यवस्थेत खूप वेळ विठ्ठलासमोर उभा होतो; पण लहानपणी आजीसोबत चंद्रभागेचे स्नान करून दोन दिवस विठ्ठल दर्शनाला रांगेत उभे राहून घेतलेले काही सेकंदांचे दर्शन अधिक भावले. त्या वेळी झालेला त्रास काही सेकंदांत संपून गेला. त्या वेळी आमची बॅग हरवली होती. त्यामुळे तीन दिवस सोबतच्या वारकऱ्यांनी आम्हाला सांभाळले.\nविठ्ठल या शब्दात ‘ठ’ ला ‘ठ’ असल्याने विशिष्ट प्रकारचा नादब्रह्म तयार होतो. त्यातून सकारात्मक ऊर्जा तयार होते. विठ्ठल नामात शरीर आणि मन जोडले जातात. मी चौथीला असताना आजीबरोबर पंढरीला गेलो होतो. विशेष पोलिस महानिरीक्षक झालो तेव्हा अतिशय बंदोबस्तात विठ्ठलाचे दर्शन घेतले. सुरक्षा व्यवस्थेत खूप वेळ विठ्ठलासमोर उभा होतो; पण लहानपणी आजीसोबत चंद्रभागेचे स्नान करून दोन दिवस विठ्ठल दर्शनाला रांगेत उभे राहून घेतलेले काही सेकंदांचे दर्शन अधिक भावले. त्या वेळी झालेला त्रास काही सेकंदांत संपून गेला. त्या वेळी आमची बॅग हरवली होती. त्यामुळे तीन दिवस सोबतच्या वारकऱ्यांनी आम्हाला सांभाळले. तेव्हापासूनच वारकऱ्यांबाबत कमालीची आत्मीयता मला वाटत आहे.\nवारीचा सोहळा सर्व धर्मसमभावाचा आहे. निरनिराळ्या संतांनी दिलेल्या शिकवणीतून हा संप्रदाय समर्थपणे उभा आहे. सर्व गोष्टींत विठ्ठल पाहता येतो. विठ्ठल दर्शन हे मुक्तीचे द्वार आहे. विठ्ठलाची मूर्ती जरी दिसत असली तरी प्रत्येकातील विठ्ठल प्रत्येकाने शोधला पाहिजे. विठ्ठलाचे नामस्मरण करताना वृत्ती बदलते. विठ्ठल नाम घेताना आपोआप आपल्यातील काम, क्रोध, लोभ, मत्सर हे षड्रिपु लोप पावतात. विठ्ठल नामाने दुजाभाव तिरस्कार, असुया लोप पावते.\nपोलिस अधीक्षक असताना शंभर किलोमीटर पायी वारी केली. यंदाही वारीच्या आधी जिथे जिथे पालखीचा विसावा आहे, तेथील बंदोबस्त करण्यासाठी मी सायकलवर वारी करीत आहे. वारकऱ्यांच्या सेवेच्या माध्यमातून विठ्ठलाची सेवा करीत आहे. सासवड ते जेजुरी दरम्यान वीस मुले माझ्यासमवेत होती. जेजुरीत आलो तेव्हा ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या गजराने नादब्रह्माची अनुभूती घेतली. नीरा येथे अपघात झाला होता. त्या वेळी रिफ्लेक्‍टर लावायच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. काही वर्षांपूर्वी लोणंदला पालखीचे आगमन आणि ईद एकाच दिवशी होती. त्या वेळी मुस्लिम बांधवांनी ईद पुढच्या दिवशी घेतली. यातच भारतीय संस्कृती अनुभवायला मिळाली. संत ज्ञानेश्‍वरांनी विश्‍वासाठी पसायदान मागितले. माउलींनी स्वतःसाठी काही मागितले नाही. जगासाठी पसायदान लिहिले. त्यांनी म्हटले की,\nविश्‍व स्वधर्म सूर्ये पाहो\nजो जे वांचिल तो ते लाहो\nमनातील वाईट प्रवृत्तींचा नाश करून त्याच्यात सद्‌गुण निर्माण व्हावे, असे मागणे माउलींनी मागितले आहे. ‘ज्याला जे पाहिजे, ते मिळू दे’, असेही त्यांनी पसायदानात मागितले. वारीतील वारकरी या साऱ्या विचारांचा पाईक असल्याचा अनुभव देतो. माउलींचे विचार वारीतील वारकऱ्यांमध्ये प्रत्ययाला येतात. वारकऱ्यांमध्येच विठ्ठल पाहतो. इतर बंदोबस्तांपेक्षा वारीच्या बंदोबस्तासाठीचे कष्ट अधिक आनंददायी वाटतात. त्यातून जीवनाचे सार उमगते. म्हणूनच विठ्ठल दुसरे कोठे नसून प्रत्येकात आहे, हेच खरे.\nसंत तुकाराम महाराज पालखी\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी\nसिद्धूचे पाक लष्करप्रमुखांना अलिंगन\nनवी दिल्ली : पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला काँग्रेसचे नेते व भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांना खास आमंत्रण होते....\nपिंपरी - दोन मुलांना मारून वडिलांची आत्महत्या\nपिंपरी (पुणे) - दोन मुलांना मारून वडिलांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना शनिवारी दुपारी ताथवडे येथे घडली. शुभम बर्मन (वय १०) रूपम वर्मा (वय...\n'एक धागा शौर्य' का सैनिकांसाठी जुन्नरच्या विद्यार्थ्यांनीचा अभिनव उपक्रम\nजुन्नर - सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांसाठी जुन्नरच्या शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थिनींनी 'एक धागा शौर्य'का हा अभिनव...\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/qna/107", "date_download": "2018-08-18T09:58:26Z", "digest": "sha1:BV4ELFZJFNBFS7PRUQLEBNJIUU6K625W", "length": 6959, "nlines": 85, "source_domain": "www.transliteral.org", "title": "जर सर्व प्राण्य़ांचा आत्मा एकच असेल तर प्राणी पक्ष्यांची भुते होतात काय? - TransLiteral - Questions and Answers", "raw_content": "\nजर सर्व प्राण्य़ांचा आत्मा एकच असेल तर प्राणी पक्ष्यांची भुते होतात काय\nसर्व धर्मात सांगितले आहे की सर्व प्राणीमात्रांचा आत्मा एकच आहे फक्त बाह्य शरीर वेगेवेगळे आहे तर मग मेल्यानंतर त्यांच्या आत्म्याचे काय होते ज्या प्राण्यांची शिकार होते त्यांची भुते होतात का ज्या प्राण्यांची शिकार होते त्यांची भुते होतात का झाली पाहिजेत ना त्या आत्म्याला सुद्धां स्वर्ग नरकाचा फेरा असतो का त्यांना पुनर्जन्म किंवा नशिबाचा भाग असतो काय त्यांना पुनर्जन्म किंवा नशिबाचा भाग असतो काय त्यांना सुद्धां जन्मज्न्मांतरीचा फेरा असतो का\nहिंदू धर्म मान्यतेनुसार आत्म्याला मरण नाही. आत्मा फक्त शरीर बदलतो. जेव्हा आत्मा शरीर धारण करून या जगात जन्म घेतो तेव्हां तो कांही वासना सोबत घेऊन येतो. शिवाय सर्व प्राण्यांत माणसाचा मेंदू अतिशय प्रगत असल्याने त्याला विचारशक्ति, आध्यात्मशक्ति इतर प्राण्यांच्या तुलनेत जास्त असते. प्राण्यांना आपले पोट भरणे आणि वंश वाढवणे या पलिकडे कांहीही वासना नसतात. आता भूत विषयाचा विचार केल्यास भूत म्हणजे एक अतृप्त आत्माच होय. म्हणून जिवंतपणी राहिलेल्या अतृप्त इच्छा, वासना पूर्ण करून घेण्यासाठीच तर भूतयोनीत आत्मा प्रवेश करतो. वासनाच नसल्याने पक्षी किंवा प्राणी यांचा आत्मा अतृप्त राहण्या प्रश्नच उरत नाही, म्हणून पक्षी किंवा प्राण्यांची भूते होत नसावीत.\nचंद्र व सूर्य यांच्या ग्रहणी जन्म झाल्यास त्याचे काय परिणाम होतात शांती, विधी काही आहे काय\nगांवे, नद्या, समुद्र, देवदेवता किंवा अन्य नांवांची उत्पत्ती काय असेल नांवे कशी पडली असतील\nआत्मा जेव्हा शरीर सोडतो तेव्हा त्याचा पुढचा प्रवास कसा असतो\nकांही धर्मात प्रेताचे दहन तर कांहीत दफन कां करतात\nपितापुत्र अथवा भाउ भाउ एकाच नक्षत्रावर जन्मले असता त्याचे काय परिणाम होतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/04/15/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-18T10:51:47Z", "digest": "sha1:7VHLPBX7ZRXXW6WZXN53YMAW4ABDY5P6", "length": 15984, "nlines": 233, "source_domain": "kayvatelte.com", "title": "फोर्ट ग्वालियर | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← सत्यम & टेक महिंद्रा चं लग्न…….\nब्लॉग लिहितानाच एक पक्कं केलेलं होतं की काही झालं तरीही प्रवासवर्णन लिहायचं नाही. मला स्वतःला प्रवासवर्णन वाचण्यात फारशी मजा येत नाही. कारण काय तर प्रवास वर्णनात लोकं अगदी आज सकाळी किती वाजता निघालो,काय खाल्लं, कुठे जेवलो, किती जेवलो, आणि किती वाजता परत आलो, असे निरर्थक डिटेल्स देतात, की जे वाचायला कंटाळवाणे होतात.\nहे प्रवास वर्णन नाही, फक्त मला आवडलेल्या एका किल्ल्याची थोडक्यात माहिती आहे. काही दिवसापूर्वी मी ग्वालियरला गेलो होतो. कित्तेक वर्ष ग्वालियरला जाणं होतंय पण तिथला किल्ला पहाण्याचा योग याच वेळेस आला. थोडा रिकामा वेळ सत्कारणी लावायचा म्हणून किल्ला पहायला गेलो होतो.\nह्या किल्ल्याचे बांधकाम इ.स. १४८० ते ११५०८ मधे राजा मानसिंह तोमर ह्या हिंदु राजाने केले होते. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज इव्हन ५०० वर्षांच्या नंतर पण ह्या किल्ल्याची परिस्थिती उत्कृष्ट आहे.\nकुठेही भिंती खचल्या नाहीत., किंवा इतर काही डॅमेजेस झाले नाहीत.आजही हा किल्ला अतिशय उत्कृष्ट अवस्थेत आहे. हेच जर आपण शिवाजी महाराजांचे किल्ले पाहिले तर एकही दालन व्यवस्थित अवस्थेत सापडत नाही.\nपूर्वीच्या काळी म्हणजे ५०० वर्षांपूर्वी रंगवण्यासाठी वापरात आलेले व्हेजिटेबल कलर्स आणि दगडांवर केलेले निळे मीना काम आजही बऱ्याच ठिकाणी सुस्थितीत आहे.\nह्या किल्ल्याची एक खास विशेषता म्हणजे ह्या किल्ल्याचे चार मजली बांधकाम आहे. त्यापैकी दोन मजले जमिनीखाली आहेत. ह्या जमिनी खालच्या मजल्यावर राणी वास होता असे म्हणतात. सगळ्यात खालच्या मजल्यावर पाळणाघर, आणि राण्यांना जलक्रीडा करण्यासाठी म्हणून केसर कुंड आणि एक फाशी घर पण आहे. ह्या किल्ल्याची उंची ३०० फुट आहे. तळघरामधे ्नैसर्गीक प्रकाशाची व्यवस्था आरसे वापरुन केलेली आहे. कुठल्याही प्रकारचे आर्टीफिशिअल लाइटींग न करता सगळीकडे व्यवस्थित प्रकाश असतो.\nभर उन्हाळ्यात पण इथे या तळ घरामधे अगदी थंड आणि शांत वाटतं.तळघरातून वर बोलता यावं म्हणून दोन पोकळ पाइप लाइन रन करण्यात आलेली आहेत भिंतीतून ह्या दोन पाइप पैकी एक पाइप बोलण्यासाठी आणि दुसरा ऐकण्यासाठी वापरात यायचा.\nराजाच्या बेडरुमच्या भोवती चारही बाजुने नर्तकी पायात घुंगरं बांधून राजाला उठवायला म्हणून सकाळी नाच करायच्या, असं तो गाइड सांगत होता. अर्थात गाइडच कितपत खरं आणि कितपत खोटं हे काही लक्षात येत नाही. तरीही अशा ठिकाणी गाइड असला की जास्त मजा येते.\nबाहेरून सजवण्यासाठी मोर, सिंह, हत्ती बदक इत्यादींच्या आकृत्या कोरण्यात आलेल्या आहे. त्या काळच्या जाळ्या सुद्धा अजुन व्यवस्थित आहे.सद्यस्थितीचा पहाता, हा किल्ला कमीत कमी अजुन ५०० वर्ष असाच उभा राहील असे वाटते.\n१६व्या शतकामधे हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. पण त्यांनी हा किल्ला डॅमेज न करता जेल म्हणून उपयोगात आणला.किल्ल्याच्याच परिसरात दोन मंदिरं पण आहेत. त्या पैकी एक सास बहु का मंदिर आणि दुसरं तेली का मंदिर ही दोन्ही मंदिरं अगदी सुस्थितीत आहेत आणि मेंटेनन्स पण सुंदर ठेवलं आहे. १६ व्या शतकात मुघलांच्या ताब्यात गेल्या मुळे सगळ्या मंदिरातील मुर्त्या मात्र चोरीला गेलेल्या आहेत.\nशिवाजी महाराजांच्या किल्ल्यापैकी एकही किल्ला अजुन बऱ्या अवस्थेत नाही ह्याचं वाइट वाटतं..त्या किल्ल्याचे कांही फोटो पिकासावर लोड केले आहेत.\n← सत्यम & टेक महिंद्रा चं लग्न…….\n3 Responses to फोर्ट ग्वालियर\nग्वालियरचा किल्ला शाबूत राहिला कारण सिंधीयांनी इंग्रजांची सोबत दिली. नाहीतर तो सुद्धा नष्ट झाला असता. शिवाजी महाराजांच्या अनेक किल्ल्यांना इंग्रजांनीच नष्ट केले आहे. त्याचे कारण असे की महाराष्ट्रातले अनेक राजे इंग्रज विरोधक होते. त्या सगळ्यांना हरवल्यावर, त्यांना गडाचा आसरा मिळू नये, म्हणून ते गड उडवून देण्यात आले.\nराजपुताना मधले अनेक किल्ले-महाल सुद्धा ह्याच कारणामुळे अजूनही सुस्थितीत आहेत.\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nसिक्रेट मेसेज कसा पाठवायचा\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.tarunbharat.com/news/600514", "date_download": "2018-08-18T10:26:13Z", "digest": "sha1:NWKKXZ4TSYAF6XHH2MZHW5JYRR6IGUIA", "length": 7435, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सेन्सेक्स विक्रमी पातळीवर, निफ्टीही जोरावर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » सेन्सेक्स विक्रमी पातळीवर, निफ्टीही जोरावर\nसेन्सेक्स विक्रमी पातळीवर, निफ्टीही जोरावर\n‘अर्निंग्ज सिझन’चा सकारात्मक प्रारंभ आणि जागतिक शेअरबाजारांकडून मिळालेले आनंददायक संकेत यांच्या जोरावर भारतातील शेअरबाजारांनी विक्रमी झेप घेतली आहे. गुंतवणूकदारांच्या उत्साहामुळे मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक गुरूवारी दिवसअखेर 282.48 अंकांच्या वाढीसह 36,548.41 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक 74.90 अंकांच्या वधारासह दिवसअखेर 11,923.20 अंकांवर बंद झाला.\nरिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांच्या दरात झालेली मोठी वाढ आणि या कंपनीच्या बाजारी भांडवलमूल्याने पुन्हा एकदा गाठलेली 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सची (6 लाख 83 हजार कोटी रूपये ) पातळी हे गुरूवारच्या दिवसाचे वैशिष्टय़ ठरले. 2008 मध्ये या कंपनीने असा विक्रम केलेला होता. त्याची पुनरावृत्ती गुरूवारी झाली.\nगुरूवारच्या व्यवहारांमध्ये बहुतेक सर्व क्षेत्रांच्या निर्देशांकात वाढ झालेली आढळून आली. रिलायन्स पाठोपाठ एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी या कंपन्यांच्या समभागांमध्ये वाढ झाली. तथापि, वेदांता व महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांच्या समभागांना पिछेहाटीचा सामना करावा लागला. एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय तसेच इंडसइंड या कंपन्यांनी निफ्टी बँक निदेशांकात तब्बल 135 अंकांची भर घातल्याचे दिसून आले. लार्सन अँड टुब्रो, कोल इंडिया, अशोका बिल्डकॉन इत्यादी कंपन्यांचे समभाग चांगले वधारले.\nयुरोपातील शेअरबाजारही गुरूवारी चांगल्यापैकी तेजीत होते. गेले काही दिवस हे शेअरबाजार अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाच्या झाकोळाखाली वावरत होते. तथापि, आता ते सावरल्याचे आणि सरावल्याचे दिसत आहे. स्टॉक्स 600 या निर्देशांकात 0.4 टक्के भर पडली. आशियातील शेअरबाजारांनीही तेजीतच दिवस संपविला. शांघाई काँपोझिट आणि निक्की यांच्यामध्ये अनुक्रमे 2.18 टक्के आणि 1.17 टक्क्यांची भर पडली.\nतज्ञांनी मात्र भारतातील गुंतवणूकदारांना सावधतेचा इशारा दिला आहे. तेजीच्या लाटेत वाहून जाऊ नका. अभ्यासपूर्वक निर्णय घ्या असा त्यांचा सल्ला आहे. येत्या काही दिवसात नफा कमाईमुळे निर्देशांक घसरूही शकतात असे त्यांचे म्हणणे आहे.\nदेशात यंदा गव्हाचे विक्रमी उत्पादन\n‘होंडा’च्या विक्रीत मोठी वाढ\nलवकरच येणार 7 कंपन्यांचे आयपीओ\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/murli-vijay-virat-kohli-cheteshwar-pujara-india-versus-australia-35728", "date_download": "2018-08-18T11:06:36Z", "digest": "sha1:CX64DSDP7BX63NYMCARWOLGB5S5VC6OI", "length": 13054, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Murli Vijay Virat Kohli Cheteshwar Pujara India versus Australia उपाहारापूर्वी विजय बाद; भारत भक्कम स्थितीत | eSakal", "raw_content": "\nउपाहारापूर्वी विजय बाद; भारत भक्कम स्थितीत\nशनिवार, 18 मार्च 2017\nरांची : मुरली विजय आणि चेतेश्‍वर पुजारा यांनी संथ आणि संयमी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताला भक्कम स्थितीत नेले. या दोघांनी तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्रात पूर्ण वर्चस्व राखले.\nउपाहारापूर्वीच्या शेवटच्या षटकात स्टीव्ह ओकीफला षटकार खेचण्याच्या प्रयत्नात मुरली विजय बाद झाला. उपाहाराला खेळ थांबला, तेव्हा भारताने दोन गडी गमावून 193 धावा केल्या होत्या. चेतेश्‍वर पुजारा 40 धावांवर खेळत होता, तर विजय 82 धावा करून बाद झाला.\nरांची : मुरली विजय आणि चेतेश्‍वर पुजारा यांनी संथ आणि संयमी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताला भक्कम स्थितीत नेले. या दोघांनी तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्रात पूर्ण वर्चस्व राखले.\nउपाहारापूर्वीच्या शेवटच्या षटकात स्टीव्ह ओकीफला षटकार खेचण्याच्या प्रयत्नात मुरली विजय बाद झाला. उपाहाराला खेळ थांबला, तेव्हा भारताने दोन गडी गमावून 193 धावा केल्या होत्या. चेतेश्‍वर पुजारा 40 धावांवर खेळत होता, तर विजय 82 धावा करून बाद झाला.\nरांचीतील खेळपट्टी फलंदाजीसाठी अद्याप पोषक आहे. या खेळपट्टीवर पुजारा आणि विजय यांनी जम बसविला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा केल्याने सुरवातीच्या दीड तासांत भारताच्या फारशा धावा झाल्या नाहीत. त्यानंतर विजय आणि पुजाराने धावांचा वेग काहीसा वाढविला.\nमात्र, संपूर्ण सत्रात ऑस्ट्रेलियाने भारताला धावांसाठी झगडण्यास भाग पाडले. तरीही पुजारा-विजय यांनी आणखी एक शतकी भागीदारी रचत भारताचा स्कोअरबोर्ड हालता ठेवला.\nउपाहाराला खेळ थांबला, तेव्हा भारत पहिल्या डावात 258 धावांनी पिछाडीवर होता. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 451 धावा केल्या होत्या. चार सामन्यांच्या मालिकेत सध्या 1-1 अशी बरोबरी आहे. हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकल्यास बॉर्डर-गावसकर करंडक ऑस्ट्रेलियाकडेच राहणार आहे. त्यामुळे सामन्यावर वर्चस्व मिळविण्याच्या दृष्टीने भारतासाठी आजच्या दिवसाचा खेळ महत्त्वाचा आहे.\nऔरंगाबाद : 'एमआयएम'च्या नगरसेवकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा\nऔरंगाबाद : महापालिकेत एमआयएम नगरसेकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या पाच नगरसेवकांविरोधात शुक्रवारी (ता.17) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयएम नगरसेवक...\nघरकामगार, बांधकाम मजूर महिलांची उपेक्षाच\nजळगाव : दिवसरात्र काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, पण डोक्‍यावर हक्काचं छत नाही...सतत कष्ट करूनही पदरी काहीच न पडल्यामुळे अनेकदा उपवास...\nथ्री डी कोलाजमधून साकारले शिवचरित्र\nइचलकरंजी - जिद्द आणि चिकाटी ठेवत तब्बल ७ वर्षे परिश्रम घेत, येथील डॉ. ज्योती दशावतार बडे यांनी थ्री डी कोलाजमधून अवघे शिवचरित्र साकारले आहे. हा...\nपावसमध्येही होमिओपॅथिक हॉस्पिटल उभारू - राऊत\nरत्नागिरी - हार-तुऱ्यांसाठी आमची पदे नाहीत. जनसेवेची आमची भूमिका आहे. १०० टक्के समाजकार्य करून तुमचे आशीर्वाद मिळविण्यातच आम्हाला धन्यता मिळते....\nश्री समर्थ दूध उत्पादक संस्थेस प्रथम क्रमांक\nमंगळवेढा : सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे मंगळवेढा तालुक्यात दूधाचे उत्पादन घटले असताना या कठीण परिस्थितीवर मात करत येथील श्री समर्थ महिला दूध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://manashakti.org/index.php?q=mr/abhyasvarga/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2018-08-18T10:24:44Z", "digest": "sha1:5E7KK5ON2YFFJ4T3MI2J3CHTWGV2XGLU", "length": 4676, "nlines": 94, "source_domain": "manashakti.org", "title": "ज्येष्ठ नागरिक | Manashakti Research Centre", "raw_content": "\nयेथे सातत्यपूर्ण मनःशांती मिळवण्याच्या सोप्या व व्यावहारीक उपायांची माहिती आहे.\nबुद्धिनिष्ठ प्रार्थनेचा, गर्भावर आणि मातेवर होणारा परिणाम\nज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न आणि समस्यांवर मार्गदर्शक उपाय तसेच त्यांच्या अनुभव संपन्न आयुष्याचा उपयोग समाजासाठी कसा करता येईल, याबद्दलचे मार्गदर्शन केले जाते.\nदेणगीमूल्य : १ व्यक्ती - रु.७३५/-.\nज्येष्ठ नागरिक - 25/09/18 लोणावळा 25/09/2018 - 26/09/2018 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०\nनवविवाहित जोडपी आणि गर्भधारणेपूर्वी\nगर्भसंस्कार (जन्मपूर्व शिक्षण-संस्कार प्रयोग)\nआध्यात्मिक विकास (योग, ध्यान, मंत्र, यज्ञ, पुजा, प्रार्थना, धर्म, देव)\n`स्वानंद' आयुर्वेदीय औषध उत्पादने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B6%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2018-08-18T10:54:49Z", "digest": "sha1:77Y24F2WEU2ILXS45MKGQJS4WT5RCSKN", "length": 16344, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "निगडीत पाचशे रुपयात कपडे दिले नाही म्हणून दुकान मालकाला कोयत्याने मारहाण - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे…\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची…\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Chinchwad निगडीत पाचशे रुपयात कपडे दिले नाही म्हणून दुकान मालकाला कोयत्याने मारहाण\nनिगडीत पाचशे रुपयात कपडे दिले नाही म्हणून दुकान मालकाला कोयत्याने मारहाण\nनिगडी, दि. ८ (पीसीबी) – पाचशे रुपयातच कपडे द्या नाही तर तुम्हाला बघून घेईन अशी धमकी देऊन चार जणांच्या टोळक्यांनी दुकानात जबरदस्ती घुसून दुकान मालकावर कोयत्याच्या उलट्या बाजूने मारुन जखमी केले आहे. ही घटना बुधवार (दि.६) रात्री साडेआठच्या सुमारास आकुर्डी येथील सरकारी रुग्णालया समोर असलेल्या ममता गारमेंट्स नावाच्या दुकानात घडली.\nयाप्रकरणी दुकान मालक पुराराम चौधरी (वय ३६, रा. आकुर्डी) याने निगडी पोलीस ठाण्यात चार अज्ञात हल्लेखोरांविरोधात फिर्याद आहे.\nपोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुराराम यांचे आकुर्डी येथे ममता गारमेंट्स नावाचे कपड्याचे दुकान आहे. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारा या दुकनात पुराराम आणि त्यांचे सहकारी कामगार मनाराम चौधरी हे होते. यावेळी त्यांच्या दुकानात तीन अनोळखी इसम कपडे घेण्यासाठी आले. त्यांनी पुराराम यांना ‘आम्हाला पाचशे रुपयातच कपडे द्या’, अशी धमकी दिली. यावर पुराराम यांनी त्यांना पाचशे रुपयातच कपडे देणार नाही असे सांगितले. यावर तीनही आरोपींनी त्यांच्या एका साथीदाराला दुकानात बोलावून घेतले. तसेच त्यांच्या जवळील कोयत्याने दुकानाची तोडफोड करुन कोयत्याच्या उलट्या बाजूने फिर्यादी पुराराम यांच्या पाठीवर वार करुन फरार झाले. निगडी पोलिसांनी चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जी.बी.खारगे तपास करत आहेत.\nPrevious articleविराट कोहली भारताचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू\nNext articleपिंपळेसौदागरमध्ये नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते वृक्षारोपण\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे पोस्टर\nपिंपळेगुरवमध्ये रविवारी पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त स्नेहमेळाव्याचे आयोजन\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\n‘मातोश्री’ बाहेर राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांचे आंदोलन; शरद पवारांवरील टीकेचा निषेध\nअटलबिहारी वाजपेयी कवी कुसुमाग्रजांचे निस्सीम चाहते\nफुरसुंगीमध्ये कार कालव्यात कोसळून कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू\nशिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; माजी महापौर दत्ता दळवींचा फोन टॅप\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच चिंचवड येथे मराठा क्रांची मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात\nकळसुबाई शिखरावर गरवारे निसर्ग प्रेमी ग्रुपचा यशस्वी ट्रेक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/dus-ka-dum-salman-khan-shoots-for-game-show-promo-1631533/", "date_download": "2018-08-18T11:08:45Z", "digest": "sha1:BHY5NQTL7ASESRIYGXZAMXTVEB46ATTN", "length": 12080, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dus Ka Dum Salman Khan shoots for game show promo | Dus Ka Dum: तब्बल आठ वर्षांनी सलमान दाखवणार ‘दस का दम’ | Loksatta", "raw_content": "\nबेशिस्त वाहनचालकांना ९१ लाखांचा दंड\nपक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा\nपुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित\nजळगावमध्ये महाजन-खडसे गटबाजीची सर्वत्र बाधा\nएमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल\nDus Ka Dum: तब्बल आठ वर्षांनी सलमान दाखवणार ‘दस का दम’\nDus Ka Dum: तब्बल आठ वर्षांनी सलमान दाखवणार ‘दस का दम’\nसलमानच्या प्रश्नांसाठी व्हा सज्ज\n‘बिग बॉस ११’नंतर सलमान खान टेलिव्हिजनवरील कार्यक्रमांपासून दूर जाणार असा अनेकांचा अंदाज होता. पण दबंग खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. लवकरच सलमान ‘दस का दम’ या शोच्या तिसऱ्या पर्वात दिसणार आहे. सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या या रिअॅलिटी शोच्या प्रोमोचे सध्या शूटिंग सुरू आहे. त्याचाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.\nया प्रोमोमध्ये तो लोकांना कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करणार असून त्यासंबंधीचे नियमदेखील सांगताना दिसणार आहे. २००९ मध्ये या रिअॅलिटी शोचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या तिसऱ्या सिझनमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आल्याची माहिती सोनी वाहिनीचे कार्यकारी उपप्रमुख दानिष खान यांनी दिली. अमिताब बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’सारखाच हा एक क्विज शो असून याची संकल्पना थोडी वेगळी आहे. ‘दस का दम’मध्ये स्पर्धक प्रश्नांची उत्तरे टक्केवारीत देतात आणि बक्षिसाची रक्कम १० हजारपासून सुरू होत १० कोटींपर्यंत असते.\nनव्या सिझनसाठी शोच्या निर्मात्यांनी एक अॅपसुद्धा तयार केला आहे. या अॅपद्वारे लोकांना घरीबसल्या या स्पर्धेत सहभागी होता येईल. जूनमध्ये हा शो प्रसारित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हा शो बिग बींच्या ‘कौन बनेगा करोडपती’इतकाच प्रसिद्ध होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nइम्रान खानच्या शपथविधीला सिद्धूंना मानाचे स्थान, घेतली लष्करप्रमुखांची गळाभेट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसहजीवनाचा पहिला टप्पा सर, थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा\n पिंपरीत पित्याने दोन मुलांची हत्या करुन केली आत्महत्या\nIt's Official: नात्यावर शिक्कामोर्तब करत अखेर निक-प्रियांका म्हणाले....\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nअंतर्गत वाहतुकीसाठी ट्रामचा पर्याय\nवाहनांना एक टोल माफ\nरेल्वेचे संगणकीय आरक्षण केंद्र पावणेतीन तास बंद राहणार\nस्वानंद देणारे शिक्षण निवडा\nवामनदादा कर्डकांना शाहिरीतून अभिवादन\nभूगावमधील हॉटेलमध्ये कोंबडय़ांच्या झुंजीवर जुगार\nपाणी पुरेना आणि म्हणे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%83%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B9-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-18T10:52:11Z", "digest": "sha1:3EFXLEGZRMG5VIWUBHFDRGEBQ4PS2GHN", "length": 10329, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निर्भय आणि निःस्पृह संन्यासी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनिर्भय आणि निःस्पृह संन्यासी\nडॉ. न. म. जोशी\nविशालनगरीचा राजा न्यायी आणि परोपकारी होता. तो सद्‌गुणांचा चाहता होता पण दुष्कृत्याला त्याच्या दरबारी कठोर शासन होत असे. एकदा असं झालं राणीचा रत्नहार महालातून गायब झाला. चोरानं चोरून नेला. राणीला तो रत्नहार अत्यंत प्रिय होता. राणी दुःखी झाली. आवडता रत्नहार गेला म्हणून ती उदास दिसू लागली. राजानं ठरवलं, चोरालाही संधी द्यावी. पश्‍चातापाला वाव द्यावा. म्हणून त्यानं घोषणा केली… “”ज्या कुणी हा रत्नहार चोरून नेला असेल त्यानं तो तीन दिवसांच्या आत आपणहून परत करावा. त्याला मृत्युदंड माफ केला जाईल. पण तीन दिवसांनंतर राज्याचे शिपाई हार शोधतील. ज्याच्याकडं हार मिळेल त्याला फाशी होईल.”\nराज्यभर दवंडी पिटली. ज्या चोरानं हार चोरला होता त्यानं ही दवंडी ऐकताच तो घाबरला न जाणो तीन दिवसाच्या आत हार परत करूनही राजानं आपल्याला शिक्षा केली तर..असा विचार करून आपल्यावर आळ येऊ नये म्हणून त्यानं तो रत्नहार एका संन्याशाच्या मठीत खिडकीतून खाली फेकून दिला. संन्यासी नदीवर स्नानासाठी गेले होते. परत येताना तर त्याला मठीत हा रत्नहार दिसला. त्या संन्याशानंही राजाची घोषणा ऐकली होती. खरं तर त्याला तो हार लगेच परत करणं आवश्‍यक वाटत होतं. पण नाही. संन्यासी तीन दिवस पूर्ण होईपर्यंत थांबला. चौथ्या दिवशी तो राजमहालात गेला आणि त्यानं रत्नहार परत केला. तो रत्नहार परत करताना संन्याशानं हेही सांगितलं की हा रत्नहार कुणीतरी आपल्या मठीत टाकला होता.\nराज्याला आश्‍चर्य वाटलं आणि राजा विचारातही पडला. राजानं संन्याशाला विचारलं, “”संन्यासीमहाराज, तुम्ही हार तुमच्याजवळ तीन दिवस का ठेवून घेतलात आणि नंतर मला तो परत का केलात आणि नंतर मला तो परत का केलात” संन्यासी हसले आणि म्हणाले, “”राजन मी हार परत केला कारण संन्याशाला याची गरज नसतेच. संन्यासी निःस्पृह असतो. पण हा हार मी तीन दिवसांपूर्वीच परत केला असता तर मी मृत्यूला घाबरलो असं लोकांना वाटलं असतं. मला मृत्युदंडाचं मुळीच भय नाही.मी निर्भय आहे. खुशाल मला मृत्युदंड कर.”\nसंन्याशाचं हे उत्तर ऐकून राजा चमकला. आदरानं तो वाकला आणि म्हणाला, “”योगीराज, आपल्यासारख्या निःस्पृह आणि निर्भय संन्याशाला आम्ही कोण मृत्युदंड देणार… आपण सुखानं आपल्या मठीत जावं आम्ही आपला आदरच करतो. धनकांचनाची ज्याला अभिलाषा असते तो निर्भय असू शकत नाही. निःस्पृहपणा आणि निर्भयपणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कारण विकार आहे तिथं भय आहे. भय आहे तिथं पाप आहे. सत्याच्या प्रकाशात निर्भय माणूस निःशंकपणे वाटचाल करू शकतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू आहेत. ते माणसाला लज्जीत तर करतातच पण विनाशाकडेही नेतात. म्हणून माणूस निर्भय होऊ शकत नाही. निर्लोभ म्हणजेच निर्भयता\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविशाल सोलंकी नवे शिक्षण आयुक्‍त\nNext articleआंध्रप्रदेशात राज्यव्यापी बंद…\n#चर्चा: राजकीय पक्ष घराणेशाहीच्या पलीकडे कधी जाणार\n#विविधा: पंडित विष्णू दिगंबर पलुसकर\n#दृष्टिक्षेप: बांगलादेशात वैचारिक स्वातंत्र्याची मुस्कटदाबी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://sahajach.com/home/mitranna_kalava.html", "date_download": "2018-08-18T10:11:51Z", "digest": "sha1:OB6QDZ34MWR7TYT6D2JSD65GGX473LPD", "length": 1432, "nlines": 17, "source_domain": "sahajach.com", "title": "Sahajach.com", "raw_content": "आपल्या मित्र-मैत्रीणींना तसेच इतरांना सहजच.कॉमबद्दल कळविण्यासाठी\nइथे खरंच कुणाची मदत करायची\nखालिल जागेमध्ये आपले नाव व ई-मेल तसेच त्याखालिल जागेमध्ये आपल्या मित्र-मैत्रीणींची नावे तसेच ई-मेल भरुन पाठविल्यास सहजच.कॉम बद्दल त्यांना आपल्यानावाने माहितीचा ई-मेल जाईल.\nइतर काही लिहायचे असल्यास खाली लिहा.\nसुचना - सहजच.कॉम वरील माहिती संबंधी\nसहजच.कॉम वरील सर्व हक्क राखिव आहेत. - अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/609786", "date_download": "2018-08-18T10:23:54Z", "digest": "sha1:GKJCE7C6WS6UQ76HKEW75O73HVHTGB52", "length": 13642, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नासाच्या ‘टच द सन’ मिशनची ऐतिहासिक झेप - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » नासाच्या ‘टच द सन’ मिशनची ऐतिहासिक झेप\nनासाच्या ‘टच द सन’ मिशनची ऐतिहासिक झेप\nयान सूर्याकडे झेपावले : 5 नोव्हेंबरला निर्धारित स्थळी पोहोचणार : सूर्याचा अधिक अभ्यास करता येणार\nअमेरिकेची अंतराळ संस्था नासाचे पार्कर सोलर प्रोब हे यान रविवारी पहाटे सूर्याच्या दिशेने यशस्वीपणे झेपावले आहे. मानवी इतिहासात पहिल्यांदाच एक अंतराळ यान सूर्याच्या दिशेने झेपावले असून हे यान 7 वर्षांमध्ये सूर्याभोवती 7 प्रदक्षिणा घालणार आहे. अमेरिकेच्या स्थानिक प्रमाणवेळेनुसार पहाटे 3.30 वाजता नासाचे हे यान ऐतिहासिक प्रवासास निघाले. स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी सुमारे 5.30 वाजता यातील सौर पॅनेल उघडण्यात आले, हे पॅनेल सूर्याची उष्णता शोषून यानाच्या प्रवासाला ऊर्जा पुरवतील. अब्जावधी डॉलर्स खर्च करून निर्माण केलेले हे यान काही दिवसांतच सूर्यानजीक पोहोचेल. यान आणि सूर्यादरम्यानचे अंतर केवळ 40 लाख मैल असणार आहे.\nसूर्याची उष्णता, सूर्यानजीकच्या वातावरणात दैनंदिन होणारे बदल, अंतराळातील हालचाली या सर्व बाबींचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे यान नष्ट होऊ नये याकरता त्यावर उष्णतारोधक आवरण बसविण्यात आले आहे. अमेरिकेचे खगोलशास्त्रज्ञ यूजीन नेवमॅन पार्कर यांचं नाव यानाला देण्यात आले आहे. या अंतराळयानाचा वेग 4 लाख 30 हजार किलोमीटर प्रतितास राहणार असून 2,500 अंश सेल्सिअस तापमान झेलण्याची यात क्षमता आहे.\nपार्कर सोलर प्रोब यान 85 दिवसांनी 5 नोव्हेंबर रोजी सूर्याच्या कक्षेत दाखल होईल. सूर्य पृथ्वीपासून सुमारे 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. यानाला सूर्यापासून 61 लाख किलोमीटर अंतरावर स्थापित केले जाईल. हे यान सूर्याच्या सर्वात नजीक पोहोचण्याचा मान मिळविणार आहे. या अगोदर सूर्याच्या सर्वात नजीक 1976 मध्ये हिलियोस-2 नावाचे यान पोहोचले होते. परंतु ते देखील सूर्यापासून सुमारे 4.3 कोटी किलोमीटर अंतरापर्यंतच गेले होते. हिलियोसच्या तुलनेत पार्कर प्रोब सूर्याच्या 7 पट अधिक जवळ असेल.\nनासाचे हे अंतराळयान सूर्यापर्यंत सुमारे 7 लाख किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने पोहोचले. पृथ्वीवर या वेगाच्या माध्यमातून केवळ 7 सेकंदांमध्ये दिल्ली ते मुंबई अंतर गाठता येणार आहे. नासा या मोहिमेकरता 1.5 अब्ज डॉलर्स (सुमारे 10 हजार कोटी) खर्च करणार आहे.\nसूर्यातून बाहेर पडणारी किरणे आणि सौरवादळांचे संशोधन करण्याचा वैज्ञानिकांचा प्रयत्न आहे. या दोन्ही गोष्टींचा पृथ्वीवर मोठा प्रभाव पडतो, तंत्रज्ञान, अंतराळयानाला सौरवादळांचा फटका बसल्याने दूरसंचार सेवा बंद पडते. पॉवरग्रिडच्या कामकाजात अडथळा निर्माण होतो. असे का घडते, या मोहिमेच्या माध्यमातून या प्रश्नांची उत्तरे शोधली जाणार आहेत. सौरवादळ पृथ्वीपासून काही अंतरावर लाखो किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने जातात आणि अंतराळाचे तापमान बदलण्यात यांची महत्त्वाची भूमिका असते. तसेच सौरवादळांमुळे पृथ्वीचे तापमान देखील प्रभावित होते.\nआम्ही आगीच्या नजीक गेलो असता, अधिक उष्णता भासते, दूर गेल्यास स्थिती पूर्ववत होते. परंतु सूर्यासोबत असे घडत नाही. सूर्याचा पृष्ठभाग 10 हजार अंश फॉरेनहाइटपर्यंत उष्ण आहे. याचे बाहेरील आवरण म्हणजेच प्रभावळक्षेत्राचे तापमान लाखो अंशांपर्यंत आहे. सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा प्रभावळक्षेत्र अधिक उष्ण का आहे, याचे रहस्य या मोहिमेमुळे उलगडू शकते.\nमानवी इतिहासात पहिल्यांदाच सूर्याच्या कक्षेनजीक पोहोचणाऱया नासाच्या यानामागे भारतीयाचे प्रयत्न कारणीभूत आहे. भारतीय वंशाचे अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ सुब्रमण्यम चंद्रशेखर यांनी 60 वर्षांपूर्वी सौरवादळांच्या अस्तित्वाशी संबंधित संशोधन प्रकाशित करण्यात मोठी भूमिका पार पाडली होती. सोलर पार्कर प्रोब हे नाव खगोलशास्त्रज्ञ युजीन पार्कर यांच्या नावावर देण्यात आले आहे. पार्कर यांनीच 1958 मध्ये पहिल्यांदा सौरवादळांचे अस्तित्व असल्याचे अनुमान व्यक्त केले होते. 1958 मध्ये 31 वर्षीय पार्कर यांनी चार्ज्ड पार्टिकल्स सातत्याने सूर्यामधून बाहेर पडतात आणि अंतराळात फैलावतात असे म्हटले होते. त्यांच्या या दाव्यावर वैज्ञानिक समुदायाने विश्वास ठेवण्यास नकार दिला होता. पार्कर यांनी ऍस्ट्रोफिजिकल जर्नलला (या क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित संशोधन पत्र) आपले संशोधन सोपविले असता दोनवेळा ते फेटाळण्यात आले. त्यावेळी संशोधन पत्राच्या वरिष्ठ संपादकांनी हस्तक्षेप करत दोन्ही समीक्षकांचा निर्णय बदलून पार्कर यांचे अनुमान प्रकाशित करण्याची अनुमती दिली होती. सुब्रमण्यम चंद्रशेखर हेच ते संपादक होते. चंद्रशेखर यांना 1983 मध्ये नोबेल पुरस्काराने देखील गौरविण्यात आले होते.\nहवामान बदलाचा ‘मुंबई’लाही धोका\nविवाह रद्द करण्याचा अधिकार आहे का \nसुरक्षा परिषदेवर भारताचे टीकास्त्र\nदिवंगत स्टिफन हॉकिंग यांचा वेदांच्या श्रे÷त्वावर विश्वास\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/athour-mapia-news/when-the-moon-shines-by-day-1629539/", "date_download": "2018-08-18T11:11:56Z", "digest": "sha1:HBOOYMZNAD2C3DPQRKX2J57PMEHCUYMD", "length": 18465, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "When the Moon Shines by Day | भूमिका : कृती ते साहित्यकृती | Loksatta", "raw_content": "\nबेशिस्त वाहनचालकांना ९१ लाखांचा दंड\nपक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा\nपुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित\nजळगावमध्ये महाजन-खडसे गटबाजीची सर्वत्र बाधा\nएमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल\nभूमिका : कृती ते साहित्यकृती\nभूमिका : कृती ते साहित्यकृती\nदेशघडणीचा काळ पाहिलेल्या लेखिका.\nनयनतारा सहगल या स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर देशघडणीचा काळ पाहिलेल्या लेखिका. वय वर्षे ९०. त्यांच्या नावावर दहा कादंबऱ्या आणि दहा ललितेतर पुस्तकं आहेत. ‘व्हेन द मून शाइन्स बाय डे’ ही त्यांची अकरावी कादंबरी. ‘भरदिवसा डोळ्यासमोर तारे चमकायला लागणे’ अशा आशयाची म्हण मराठीत आहे. या म्हणीत जो अर्थ अभिप्रेत आहे तोच लेखिकेला या शीर्षकातून अपेक्षित आहे. रात्री चमकणारा चंद्र दिवसाही चमकायला लागला आहे. कुठेतरी काहीतरी गडबड आहे आणि तिचा गांभीर्याने विचार करायला हवा आहे, असं त्यांचं कळकळीने सांगणं आहे आणि ते साहित्यिक पद्धतीने त्यांनी सांगितले आहे.\nबुद्धीप्रामाण्यवादी लेखक-विचारकांच्या हत्या आणि देशातील वातावरण कलुषित करणाऱ्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर साहित्य अकादमीसारखे सरकारी पुरस्कार परत करण्याची मोहीमच काही मंडळींनी २०१५ साली उघडली होती. त्यात नयनतारा सहगल या आद्य होत्या. साहित्य अकादमी पुरस्कार परत करून नयनतारा यांनी इथल्या बुद्धिमंतांना आपली अस्वस्थता व्यक्त करण्यासाठीचं एक प्रतीकात्मक हत्यार मिळवून दिलं होतं. त्यांच्या त्या कृतीनंतर देशभरातील काही बुद्धीजिवी मंडळींनीही पुरस्कार परत केले. धर्मनिरपेक्षतेचं वस्त्र विस्कटणं हे देशासाठी घातक ठरेल, हे कलावंत बजावून सांगू लागले.\nपुरस्कार परत करणं ही एक भूमिका होती. पण नयनतारा यांच्यातील अस्वस्थ लेखिकेचं तेवढय़ाच कृतीने समाधान झालं नसावं. त्यांच्या त्या अस्वस्थतेतूनच ही छोटेखानी कादंबरी लिहिली गेली आहे. कादंबरी कशी आहे, हा भाग अलाहिदा, परंतु वयाच्या नव्वदीतही अस्वस्थ होण्याची आणि व्यक्त होण्याची त्यांची ऊर्मी किती तीव्र आहे, हेच त्यांच्या या लिखाणातून जाणवते. आजच्या परिस्थितीवरचं दाहक, बोचरं भाष्य म्हणून या कादंबरीकडे पाहायला हवं.\nया कादंबरीत रेहाना ‘एशियन्स अगेन्स्ट टॉर्चर’ या मानवी हक्कांसंबंधी जागरूक असणाऱ्या संघटनेबरोबर काम करते आहे. आपलं काम सुरूच ठेवण्याचं कारण स्पष्ट करून सांगताना ती म्हणते, ‘कारण चंद्र दिवसा तळपतो आणि सूर्य रात्री, याच्याशी सहमत व्हायला नकार दिला म्हणून लोकांचा छळ होतो आहे.’ पुस्तकांवर बंदी, चित्रं उद्ध्वस्त केली जाणं, गायीच्या कातडय़ापासून बनवलेली सूटकेस वापरली म्हणून लोकांचे खून होणं, ‘डायरेक्टर ऑफ कल्चरल ट्रान्स्फॉर्मेशन’ म्हणजेच डीसीटीची सगळ्यांवर नजर असणं.. अशा घडामोडी कादंबरीत घडत जातात.\nरेहाना, नंदिनी, अरुणा आणि लिली यांचा बुक क्लब आहे. त्या दर आठवडय़ाला भेटून पुस्तकांवर चर्चा करतात. त्यात मुघल इतिहासात रस असलेला कमलेशसारखा सरकारी अधिकारीही आहे, त्याला शहाजहानच्या कारकीर्दीचा अभ्यास करायचा आहे. फ्रान्झ रोहनर हा जर्मन इतिहासकार आहे. बुक क्लबच्या बैठकीत कमलेश ताजमहालाविषयी बोलतो. त्यांच्या चर्चामधून १९३० आणि ४० च्या दशकांतल्या युरोपशी आजच्या भारताची तुलना होते.\nरेहाना आणि तिच्या या मित्रमंडळींच्या गप्पांमधून दहशतीचं वातावरण जाणवत राहतं. डीसीटी हे सरकारी खातं सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून असतं. डीसीटीच्या अधिपत्याखाली असलेल्या समाजात कुणालाही दुसऱ्याला भेटलं की ‘भारत माता की जय’ असं अभिवादन करणं सक्तीचं केलं जातं. या खात्याने अल्पसंख्याकांना घेट्टोमध्ये राहण्याची सक्ती केलेली असते. मध्ययुगीन इतिहासावरचे रेहानाच्या वडिलांचे पुस्तक दुकानांतून नाहीसं केलं जातं. प्रियकर झमीरच्या लिखाणामुळे त्याच्या वाटय़ाला आलेलं दुर्दैव रेहाना पाहते आहे.\nरोजच्या जगण्यात रेहानाच्या अवतीभवती असं क्रौर्य असलं तरीही ती भवतालाविषयी कुतूहल राखून आहे. त्यातून तिला समजतं, की तिचा नोकर अब्दुल्लाला घराबाहेर पडलं की मुरारीलाल या नावाने वावरणं सुरक्षित वाटतं. पण त्याचाच मित्र असलेल्या सूरज नावाच्या दलित तरुणाला मात्र असं कोणतंच सुरक्षाकवच मिळत नाही. आर्ट शोच्या उद्घाटनाच्या दिवशीच सायरस बाटलीवालाच्या गॅलरीत बॉम्ब फुटतो. तर युद्धविरोधी विचारांसाठी कमलेशला विरोध सहन करावा लागतो. हे सगळं ‘हिंदू’ या वंशाचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी चाललेलं असतं. बुक क्लबमधल्या चर्चेत इतिहासकार रोहनर सगळ्यांना बजावतो की, सगळ्या क्रांती शेवटी एकाच मार्गावरून जातात हे लक्षात ठेवा जर्मनवंशीय रोहनरच्या मते जर्मनांचा ‘भूतकाळ’ हा भारतीयांचा ‘भविष्यकाळ’ आहे.\nएकूणच लेखिकेने या कादंबरीतून उपहासात्मकरीत्या सध्याच्या परिस्थितीबद्दलची आपली राजकीय असहमती मांडली आहे. त्यातून ‘आज’च्या भारताचं चित्र वाचकांसमोर उभं राहिलं तर नवल वाटायला नको\n‘व्हेन द मून शाइन्स बाय डे’\nलेखक : नयनतारा सहगल\nप्रकाशक : स्पीकिंग टायगर\nपृष्ठे : १६८, किंमत : ३९९ रुपये\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n पिंपरीत पित्याने दोन मुलांची हत्या करुन केली आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nIt's Official: नात्यावर शिक्कामोर्तब करत अखेर निक-प्रियांका म्हणाले....\nसहजीवनाचा पहिला टप्पा सर, थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा\nइम्रान खानच्या शपथविधीला सिद्धूंना मानाचे स्थान, घेतली लष्करप्रमुखांची गळाभेट\nमिनी एसयुव्हीसारखं डिझाईन असलेली नवीन रेनाँ क्विड वसूल करते तुमचा पै न पै\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nअंतर्गत वाहतुकीसाठी ट्रामचा पर्याय\nवाहनांना एक टोल माफ\nरेल्वेचे संगणकीय आरक्षण केंद्र पावणेतीन तास बंद राहणार\nस्वानंद देणारे शिक्षण निवडा\nवामनदादा कर्डकांना शाहिरीतून अभिवादन\nभूगावमधील हॉटेलमध्ये कोंबडय़ांच्या झुंजीवर जुगार\nपाणी पुरेना आणि म्हणे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/coverstory-news/lokprabha-wedding-special-issue-article-5-1622020/", "date_download": "2018-08-18T11:12:58Z", "digest": "sha1:XH4OETP2WEQNERT347GRIILNY7BE3TJI", "length": 26058, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "lokprabha wedding special issue article 5 | परदेशी जोडप्यांची ‘भारतीय’ लग्नं! | Loksatta", "raw_content": "\nबेशिस्त वाहनचालकांना ९१ लाखांचा दंड\nपक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा\nपुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित\nजळगावमध्ये महाजन-खडसे गटबाजीची सर्वत्र बाधा\nएमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल\nपरदेशी जोडप्यांची ‘भारतीय’ लग्नं\nपरदेशी जोडप्यांची ‘भारतीय’ लग्नं\nमदुराईमध्ये चिहारू आणि युटो निआंगा या जपानी जोडप्यानं लग्न केलं.\nचिहारु आणि युटो निआंगा या जपानी जोडप्याने मदुराईमध्ये भारतीय पद्धतीने लग्न केलं\nपरदेशी वधू-वरांनी इथे येऊन भारतीय पद्धतीने विवाह केला अशा बातम्या अधूनमधून कानावर येतात. या परदेशस्थ जोडप्यांना भारतीय पद्धतीनं लग्न करावं, असं का वाटतं काय असेल त्यामागची मानसिकता आणि पाश्र्वभूमी\nअलीकडेच एक बातमी वाचली. मदुराईमध्ये चिहारू आणि युटो निआंगा या जपानी जोडप्यानं लग्न केलं. चार वर्षांपूर्वी चिहारू तामिळनाडूमध्ये भाषा संशोधनासाठी आली होती. या संशोधनादरम्यान तिनं तामिळनाडूमधील संस्कृतीविषयी जाणून घेतलं. त्यावेळी तिला मिळालेल्या इथल्या लग्नपद्धतीच्या माहितीमुळे ती खूप प्रभावितही झाली होती. या जोडप्याचं लग्न गेल्या वर्षी जपानमध्ये झालं होतं. पण भारतीय विवाह पद्धतीमुळे प्रभावित झाल्याने त्यांनी पुन्हा भारतीय पद्धतीने विधिवत लग्न करायचं ठरवलं. टोकियोहून आलेल्या मोजक्याच नातलगांच्या उपस्थितीतलं हे लग्न काही परिचितांच्या मदतीनं झालं. चिहारूला अस्खलित तामिळ भाषा बोलता येते. त्यांच्या लग्नासाठी तामिळ पद्धतीच्या मंडपात फुलांची आरास केलेली होती. वधूने भरजरी कपडे आणि दागिने घातले होते. सप्तपदीसह कन्यादानाचा विधीही पार पडला. एरवी जपानमध्ये चर्चमध्ये लग्न करण्याची पद्धत आहे, असा त्या बातमीचा तपशील होता. याआधीही अनेक परदेशी जोडप्यांनी, प्रसंगी परदेशी पर्यटकांनी भारतीय विवाह पद्धतीचं कौतुक केलेलं दिसतं.\nभारतातली लग्नं जास्त काळ टिकतात, असं दिसतं. त्यामुळं लग्नाच्या वेळी झालेले संस्कार, शपथा आदी गोष्टींमुळं एकत्र राहाणं प्रदीर्घ काळ होतं, अशा प्रकारची भावना या परदेशी जोडप्यांत निर्माण होत असावी. भारतीय लग्नांच्या विधीमधून वधू-वरांवर अनेक प्रकारचे विधी आणि संस्कार केले जातात. या संदर्भात लक्ष्मण पारेकर गुरुजी सांगतात की, विवाह आठ पद्धतींनी होतो. सध्या एकच पद्धत प्रचलित आहे ती म्हणजे ब्राह्मणी विवाह. या विवाहाचे ऋग्वेद आणि यजुर्वेदातील संदर्भ लक्षात घेता त्यातील कन्यादानामुळे वर-वधूच्या काही पिढय़ांचा उद्धार केला जातो. हिंदू धर्मात विवाह संस्कार झाल्यानंतर त्यातून मुक्तता नाही. कायद्यानं घटस्फोट घेतला जात असला तरी संस्कारांनुसार त्यातून मुक्तता नाही. कन्यादानाच्या वेळी धर्म, अर्थ, काम यांचा अतिरेक होऊ देणार नाही, अशा अर्थाची शपथ वर घेतो. सप्तपदी चालताना वधू-वरांमध्ये मित्रत्वाचं नातं निर्माण होतं. अनेकदा या मंत्रांचे अर्थ वधू-वरांना नीट समजावून सांगितले जातात. भारतात संशोधनाच्या किंवा अभ्यासाच्या निमित्तानं आलेले परदेशी मुलं-मुली भारतीय संस्कृतीतले संस्कार आणि परंपरा सखोल समजून घ्यायचा प्रयत्न करतात. त्या संदर्भात अधिक वाचन करतात. त्यातून भारतीय पद्धतीच्या लग्नाविषयी त्यांना माहिती मिळते.\nया आधीही हिंदू संस्कृतीनं प्रभावित झालेल्या कॅनडाच्या झेवियर आणि जेसिका यांनी भारत भेटीदरम्यान अनेक ठिकाणी हिंदू वैदिक पद्धतीनं होणारे विवाह पाहिले. त्यामुळं प्रभावित झाल्यानं त्यांनीही भारतीय परंपरेनुसार विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पुष्करमध्ये स्थानिक मित्र अमित भट्टच्या मदतीनं लग्न केलं. यावेळी कन्यादान अमित आणि त्याची पत्नी श्रुती भट्ट यांनी केलं. वरमाळा घालणं, फेरे घेणं, भांगात कुंकू भरून मंगळसूत्र घालणं असा सगळा सोहळा तेव्हा पार पडला होता. भारतीय लग्न आणि कुटुंब व्यवस्थेबद्दल परदेशी लोकांना खूपच कुतूहल आणि आकर्षण असतं. भारतीयांच्या लग्नात केवळ दोन तरुण जिवांनी एकत्र येणं एवढीच गोष्ट नसते. तर त्यात त्या त्या घरातल्या चालीरीती, रूढी, परंपरांचाही समावेश असतो.\nकाही वेळा केवळ भारतीय संस्कृती-परंपरेचं आकर्षण किंवा अभ्यास नसतो. तर इथल्या मातीशी आणि इथल्या माणसांशी जडलेल्या ऋणानुबंधांमुळेही भारतीय पद्धतीनं लग्न केलं जातं. त्यानुसार दाखला द्यायचा झाल्यास दोन वर्षांपूर्वी आनंदवनात पोलंडच्या राजघराण्यातील लुसियन टर्नाव्हास्की आणि त्याची पत्नी लिवा यांचा विवाह झाला. लुसियन प्रसिद्ध लेखक ऑर्थर टनरेव्हास्की यांचा मुलगा आहे. काही वर्षांपूर्वी ऑर्थर भारतभेटीवर आले असताना बाबा आमटे यांच्या कार्यानं ते प्रभावित झाले. स्वत: पोलिओचे रुग्ण असल्यामुळं त्यांच्यात कुष्ठरुग्णांसाठी काम करणाऱ्या बाबांविषयी आत्मीयता निर्माण झाली. पुढं ऑर्थर यांच्या पुढाकारामुळं आनंदवनात ‘संधीनिकेतन’ या अपंगासाठीच्या प्रकल्पाची उभारणी झाली. २०१२ मध्ये ऑर्थर यांच्या निधनानंतर त्यांच्या इच्छेनुसार हिंदू पद्धतीनं त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. तसंच त्यांच्या अस्थी बाबांच्या समाधीशेजारी पुरून त्यावर आनंदवनातील प्रथेनुसार झाड लावण्यात आलं. त्यानंतरही ऑर्थर यांच्या कुटुंबाचा आनंदवन आणि भारतीय परंपरांशी ऋणानुबंध कायम असल्यानं लुसियन यांनी हिंदू वैदिक पद्धतीनं विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार डॉ. प्रकाश आमटे यांच्या पुढाकारानं लुसियन आणि लिवा यांचा विवाह झाला.\nकाही वेळा परदेशी सामान्यच नव्हे तर सेलिब्रिटींनाही भारतीय विवाह पद्धतीची भुरळ पडलेली दिसते. अमेरिकन गायिका आणि गीतकार केटी पेरीचं लग्न इंग्लिश कॉमेडियन आणि अभिनेता रसेल ब्रॅण्डशी राजस्थानात थाटामाटात लागलं होतं. जर्मन सुपर मॉडेल आणि अभिनेत्री हैदी कुल्मचं लग्न गायक-गीतकार सील याच्याशी लागलं. मेक्सिकोत लग्न झाल्यावर लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसाला ते भारतात फिरायला आले होते. वाराणसीतल्या वातारणाने ते प्रभावित झाले आणि त्यांनी मेक्सिकोमध्ये मिनि-बनारस तयार करून घेतलं. आपल्याकडच्या पंडितांनी तिथं जाऊन त्यांचं लग्न लावलं होतं. पुढं त्यांनी घटस्फोट घेतला. अमेरिकन अभिनेत्री आणि लेखिका पद्मालक्ष्मी यांनी प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्याशी न्यूयॉर्कमध्ये दाक्षिणात्य पद्धतीनं लग्न केलं होतं. या लग्नातला थाटमाट हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही पद्धतींचा होता. पुढं त्यांनी घटस्फोट घेतला. तर इंग्लिश मॉडेल आणि अभिनेत्री एलिझाबेथ हर्ले आणि भारतीय उद्योगपती अरुण नायर यांचं लग्न हा मोठय़ा चर्चेचा विषय ठरला होता. जोधपूरमध्ये झालेल्या या लग्नसोहळ्यात लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला होता.\nखुद्द आपल्याकडच्या लग्नात (मराठी) मात्र अलीकडे अनेकदा मुख्य लग्नसंस्कारांमध्ये काटछाट होताना दिसते. काही मोजकेच विधी होताना दिसतात. अर्थात जे विधी होतात, त्यातल्या किती विधींचा अर्थ किंवा ते संस्कार वधू-वर आणि त्यांच्या कुटुंबीयांना समजलेले असतात, ही गोष्ट गुलदस्त्यातच राहते. काही वेळा हे संस्कार आणि विधी जाणून घ्यायची इच्छा असते पण समजावणारे गुरुजी आणि वेळ यांची वानवा असते. मग अनेकदा लग्नातले बाकीचे सोपस्कारच वरचढ होताना दिसतात. या लेखासाठी माहिती गोळा करत असताना भारतात लग्न करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची पूर्तता करावी लागते, याबद्दल मार्गदर्शन करणाऱ्या काही साइट्सही दिसल्या.. या पाश्र्वभूमीवर अनेक परदेशस्थ जोडपी आपल्या देशात येऊन विधिवत लग्नसोहळा करत आहेत. विधी आणि संस्कारांबद्दल जाणून घेत आहेत. कदाचित हा अर्थ समजून घेतला तर आपलं लग्न भारतीयांप्रमाणं टिकेल, ही भावना त्यामागं असावी. पण केवळ धार्मिक विधी आणि संस्कारांमुळं लग्न टिकतं का विशेषत: भारतीय लग्न टिकतं का विशेषत: भारतीय लग्न टिकतं का की प्रेम, परस्पर विश्वास, कुटुंबसंस्थेचा अद्याप बऱ्यापैकी शाबूत असलेला पाया, भावनिक, आर्थिक आणि सामाजिक गुंतवणुकीसह अनेक बाबी यासाठी कारणीभूत ठरतात का याविषयी पुन्हा केव्हातरी..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n पिंपरीत पित्याने दोन मुलांची हत्या करुन केली आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nIt's Official: नात्यावर शिक्कामोर्तब करत अखेर निक-प्रियांका म्हणाले....\nसहजीवनाचा पहिला टप्पा सर, थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा\nइम्रान खानच्या शपथविधीला सिद्धूंना मानाचे स्थान, घेतली लष्करप्रमुखांची गळाभेट\nमिनी एसयुव्हीसारखं डिझाईन असलेली नवीन रेनाँ क्विड वसूल करते तुमचा पै न पै\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nअंतर्गत वाहतुकीसाठी ट्रामचा पर्याय\nवाहनांना एक टोल माफ\nरेल्वेचे संगणकीय आरक्षण केंद्र पावणेतीन तास बंद राहणार\nस्वानंद देणारे शिक्षण निवडा\nवामनदादा कर्डकांना शाहिरीतून अभिवादन\nभूगावमधील हॉटेलमध्ये कोंबडय़ांच्या झुंजीवर जुगार\nपाणी पुरेना आणि म्हणे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tarunbharat.com/news/600491", "date_download": "2018-08-18T10:26:04Z", "digest": "sha1:UR3C6SQA24T6V7TT77F33HC7EZS2QBJN", "length": 6766, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कुपवाडामध्ये दहशतवाद्याचा खात्मा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कुपवाडामध्ये दहशतवाद्याचा खात्मा\nश्रीनगर / वृत्तसंस्था :\nजम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये गुरुवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला यमसदनी पाठविले आहे. तेथील दहशतवाद्यांसोबतची चकमक गुरुवारी उशिरापर्यंत सुरूच होती.\nकुपवाडा जिल्हय़ाच्या जंगली भागात सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेल्याचे सैन्याच्या एका अधिकाऱयाने सांगितले. सैनिकांच्या एका गस्त पथकावर गोळीबार झाल्यानंतर कुपवाडाच्या कांदी वनक्षेत्रात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या विरोधात मोहिमेस प्रारंभ केला होता.\nबुधवारी कुपवाडा जिल्हय़ात निदर्शक आणि सैन्याच्या एका गस्तपथकादरम्यान झालेल्या संघर्षात एक फुटिरवादी मारला गेला होता. मृत फुटिरवाद्याचे नाव खालिद गफ्फार असून तो कुपवाडा येथील त्रेहगाममध्ये मारला गेला.\nखालिदच्या मृत्यूनंतर भागात तणावाचे वातावरण आहे. प्रशासनाने गुरुवारी त्रेहगाम भागात संचारबंदी लागू केली. रस्त्यांवर हिंसक निदर्शने होण्याच्या शक्यतेमुळे हा निर्णय घेण्यात आला. कुपवाडा येथील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. प्रशासनाने बारामूल्ला आणि कुपवाडामध्ये खबरदारीच्या स्वरुपात मोबाईल इंटरनेट सेवांवर बंदी घालण्यात आली आहे.\nबुधवारी रात्री 8 वाजता 30 ते 40 जणांच्या समुहाने सैन्याच्या गस्तपथकावर दगडफेक केली. दगडफेक करणाऱयांना तोंडी इशारा देण्यात आला. तरीही दगडफेक सुरूच राहिल्याने हिंसक जमावाला पांगविण्यासाठी हवेत गोळीबार करण्यात आला. पण जमावाने हिंसाचार सुरूच ठेवल्याने 5 सैनिक जखमी झाले. बचावासाठी हिंसक जमावावर गोळीबार करावा लागल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिली.\nबँकिग विषयक अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nगांधी हत्याकांड : न्यायमित्राची नियुक्ती\nसूदान-इजिप्तदरम्यान इंदोरच्या युवकाचा देश\nकाश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.vidyawarta.com/03/?p=4279", "date_download": "2018-08-18T11:05:58Z", "digest": "sha1:ATN35VP6J2JMFXGV5FPNLKCEMCHKJ35Q", "length": 10966, "nlines": 236, "source_domain": "www.vidyawarta.com", "title": "Historical Books | Printing Area", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय बहुभाषिक संशोधन पत्रिका\nशोधपत्र भेजने कि अंतिम तिथी: 20 (हर माह)\nशोधपत्रिका प्रकाशन तिथी 30 (हर माह)\nजर कोणाला पुढील पैकी कोणती ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात हवी असतील तर दिलेल्या लिंक वर जाऊन प्राप्त करावीत\n2. अशोक आणि मौर्यांचा ऱ्हास\n4. आसे होते मोगल\n5. इस्ट इंडिया कंपनीचा पेशवे दरबाराशी फारशी पत्रव्यवहार\n6. उत्तरकालीन मुघल खंड दुसरा\n8. क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजीमहाराज यांचे चरित्र\n9. क्षत्रियांचा प्राचीन इतिहास\n10. खरे जंत्री ( शिवकालीन संपूर्ण शकावली ) १६२९ ते १७२८\n11. घोरपडे घराण्याचा इतिहास\n12. छत्रपती शिवाजी महाराज\n13. तंजावरचे मराठे राजे\n14. ताराबाई आणि संभाजी १७३८ – १७६१\n18. दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास\n19. निजाम पेशवे संबंध १८ वे शतक\n22. पुणे अखबार भाग १\n23. पुणे अखबार भाग 2\n24. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग २\n25. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग ३\n28. पेशवाईचे दिव्य तेज\n30. पेशवाईतील पश्चिम दिग्विजय\n31. पेश्वीतील उत्तर दिग्विजय\n33. पेश्वीतील धर्म संग्राम\n34. पोर्तुगीज मराठा संबंध\n35. प्राचीन दक्षिण हिंदुस्थान\n37. भगवान बुद्ध पूर्वार्ध\n39. भारत इतिहास संशोधक मंडळ अहवाल शके १८३२\n40. भारतवर्षाचा संक्षिप्त इतिहास\n41. भारतीय लिपींचे मौलिक एकरूप\n42. मराठांच्या राज्य कथा\n43. मराठी दफ्तर रुमाल दुसरा\n44. मराठी बखर गद्य\n45. मराठी रियासत मध्य विभाग ३\n46. मराठे व इंग्रज आवृत्ती तिसरी\n47. मराठे व इंग्रज आवृत्ती दुसरी\n51. मराठ्यांच्या इतिहासाची साधने पोर्तुगीज दफ्तर खंड तिसरा १६६३ – १७३९\n52. मराठ्यांच्या उत्तरेतील मोहिमा १७२० – १७४०\n53. मराठ्यांच्या लढायांचा इतिहास १८०२ – १८१८\n57. महाराष्ट्र व गोवे शिलालेख\n58. महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड भाग २ (१७०७ ते १८१८ )\n59. महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास\n60. महाराष्ट्रातले खलपुरूष घाशीराम कोतवाल\n62. महाराष्ट्रातील स्वतंत्र लढे\n63. महेश्वर दरबारची बातमीपत्रे\n65. मुंबई इलाख्यातील जाती\n67. मुघल साम्राज्याचा ऱ्हास भाग १\n69. मुसलमान सुफी संतांचे मराठी साहित्य\n70. मुसलमानपुर्व महाराष्ट्र इ.पु. २०० ते इ.स. १३१८\n72. मोगल दरबारची बातमीपत्रे खंड २\n73. मोगल दरबारची बातमीपत्रे\n74. म्हणे लढाई संपली \n76. राजा राममोहन राय\n77. रायगडची जीवनकथा पहिली आवृत्ती\n79. वंश आणि वंशवाद\n80. वसईची मोहीम १७३७ ते १७३९\n82. शिव – चरित्र – निबंधावली\n83. शिवकाल १६३० ते १७०७\n84. शिवकालीन महसुल व्यवस्था\n87. श्री छत्रपती राजाराम महाराज यांचे चरित्र\n88. श्री भाऊंच्या वीरकथा\n90. श्री शिवराज्याभिषेक प्रयोग\n91. श्रीमंत महाराज भोसले यांची बखर\n93. श्रीरामदासांची एतिहासिक कागदपत्रे\n96. सह्याद्रीच्या पायथ्याशी आक्रमण १ ले\n98. हि रामाची आयोध्या\n99. हिंदुस्तानची सामाजिक उत्क्रांती १७९० – १९४०\n100. हुतात्मा दामोदर हरी चाफेकर यांचे आत्मवृत्त\n101. हैदराबाद स्वतंत्र संग्राम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://marathisaahitya.blogspot.com/search?updated-max=2013-06-12T14:24:00%2B05:30&max-results=5&reverse-paginate=true", "date_download": "2018-08-18T10:31:14Z", "digest": "sha1:OFJ43SO3NJKF4NX3ALJMP7YUHNJWHNHQ", "length": 6317, "nlines": 122, "source_domain": "marathisaahitya.blogspot.com", "title": "मी मराठी : A Blog for Marathi Fun,Marathi Jokes,Marathi Poems,Marathi SMS and All about Marathi", "raw_content": "\nमी मराठी: - हा कुठलाही फ़ुकटचा कोड कॉपी करुन देण्यासाठी बनविन्यात आलेला नाही. तसेच जे लोकांना एखादा विनोद एकणे,वाचणे म्हणजे वेळेचा अपव्यय (मराठीत टाईमपास) वाटतो त्यांच्यासाठी सुधा नाही. या ब्लॉगवरील सर्व साहित्या हे कुठल्या ना कुठल्या मेलधुन आलेले आहे व ते एका ठीकाणी ठेवायचे म्हणुन हा सगळा उद्योग केलेला आहे.(कानात ह्ळुच :- सर्व चोरलेले आहे) दोन घडी हसायचे असेल तरच इथे वेळ घालवा अन्यथा गुगल आहेच..... Marathi Poems, Marathi Jokes, Marathi Poems, Marathi Shayari and more\nम्हणून मी हल्ली बोलतच नाही\nसुरेश भट : आठवणीतल्या काही कविता\nसुरेश भट : आठवणीतल्या काही कविता\n१०१ Puneri Paatya - पुणेरी पाट्या\nPuneri Paatya, Graphiti, Marathi Jokes, Mail Forwards आलेले मेल, सापडलेले फ़ोटो, कुणीतरी दिलेल्या कविता , सडलेले विनोद फ़ुटकळ साहित्य .\nइमेज निट पहाण्यासाठी त्यावर उंदराचे बटण दाबा.\nआजकाल WhatsApp सारख्या माध्यमामुळे लेखकांचे साहित्य जगभर पसरत आहे परंतु बरेच जण ते कुणा दुस-याच्या नावाने वा स्वताच्या नावानेही प्रसिद्ध करतात. ज्याचे त्याचे श्रेय त्यांना मिळालेच पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहोत. बर-याचदा असेही आढळले आहे कि कुठलातरी विनोद किंवा कविता अगदी पु.ल. किंवा सुरेश भट यांच्या नावाने पाठवली जाते. तरी वाचकांनी मूळ लेखकाचा शोध घ्यावा व असे साहित्य आढळल्यास प्रसिद्ध करणा-या वेबसाईटला कळवावे . आपल्याला आपले साहित्य या ब्लॉगवर कुणा दुसर-याच्या नावाने किंवा आपल्याला श्रेय न देता प्रसिद्ध केलेले आढळल्यास कृपया vikram.taware@gmail.com या आयडी वर संपर्क करा. या ब्लॉगवरील कुठलेही साहित्य आम्ही स्वतः लिहिलेले नाही व विक्रम तावरे हे लेखक नाहीत त्यामुळे मूळ लेखकाला श्रेय देण्यामध्ये आम्हाला कुठलीही आपत्ती नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-p520-point-shoot-digital-camera-red-price-pNkFi.html", "date_download": "2018-08-18T10:10:59Z", "digest": "sha1:OO5QAT7CN7U57U3YIEIAODOAGUNTJPHP", "length": 20371, "nlines": 493, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स प्५२० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स प्५२० पॉईंट & शूट\nनिकॉन कूलपिक्स प्५२० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\nनिकॉन कूलपिक्स प्५२० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स प्५२० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\nनिकॉन कूलपिक्स प्५२० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स प्५२० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स प्५२० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड नवीनतम किंमत Jun 11, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स प्५२० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेडफ्लिपकार्ट, पेप्परफारी उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स प्५२० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड सर्वात कमी किंमत आहे, , जे पेप्परफारी ( 22,998)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स प्५२० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स प्५२० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स प्५२० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 39 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स प्५२० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन कूलपिक्स प्५२० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड वैशिष्ट्य\nलेन्स तुपे NIKKOR Lens\nअपेरतुरे रंगे F3 - F5.9\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 18.1 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 inch\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/4000 sec\nमिनिमम शटर स्पीड 1 sec\nस्क्रीन सिझे 3.2 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 921,000 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 4:3, 16:9, 1:1\nऑडिओ फॉरमॅट्स WAV, AAC\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC / SDXC\nइनबिल्ट मेमरी 15 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nनिकॉन कूलपिक्स प्५२० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-fathers-day-special-53480", "date_download": "2018-08-18T10:45:54Z", "digest": "sha1:JBP3LKN6ECBPIGQMCW4BECIEXGZ5ZLYR", "length": 31652, "nlines": 218, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news fathers day special आदर्शांचा वारसा देणारे ‘वडील’ कुटुंब | eSakal", "raw_content": "\nआदर्शांचा वारसा देणारे ‘वडील’ कुटुंब\nरविवार, 18 जून 2017\nपितृऋण जपणाऱ्या सराफ्यातील पुरवारांची कथा\nऔरंगाबाद - वडिलांकडून कुणाला उद्योगाचा वसा मिळतो, तर कुणाला व्यवसायाचा वारसा; पण देशप्रेम आणि समाजऋण जपण्याचा वारसा सलग चार पिढ्या पुढीलांना देणारे घराणे औरंगाबादेत आहे. सराफ्यातील पुरवार घराण्यातील तीन वडिलांनी पुढच्या पिढ्यांना कला, संस्कृती, देशभक्ती आणि इतिहासनिष्ठेचा वारसा दिला. आता चौथी पिढी हे संचित जपताना शहराच्या समृद्धीत भर घालण्याचे काम निष्ठेने करत आहे.\nपितृऋण जपणाऱ्या सराफ्यातील पुरवारांची कथा\nऔरंगाबाद - वडिलांकडून कुणाला उद्योगाचा वसा मिळतो, तर कुणाला व्यवसायाचा वारसा; पण देशप्रेम आणि समाजऋण जपण्याचा वारसा सलग चार पिढ्या पुढीलांना देणारे घराणे औरंगाबादेत आहे. सराफ्यातील पुरवार घराण्यातील तीन वडिलांनी पुढच्या पिढ्यांना कला, संस्कृती, देशभक्ती आणि इतिहासनिष्ठेचा वारसा दिला. आता चौथी पिढी हे संचित जपताना शहराच्या समृद्धीत भर घालण्याचे काम निष्ठेने करत आहे.\nमूळचे मध्य भारतातील पुरवार घराणे सुमारे तीन-चारशे वर्षांपूर्वी औरंगाबादेत आले. निजाम प्रांतात उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्यलढ्यात या घराण्यातील जानकीलाल पुरवार यांचे मोठे योगदान राहिले. परिसरातील स्वातंत्र्यसैनिकांशी त्यांची जवळीक होती. त्यांच्या वाड्यातील तळघरात असलेल्या आखाड्यात सगळे जमत असत. यातच हुतात्मा अनंत कान्हेरे यांना क्रांतिकार्याची प्रेरणा मिळाली. मराठवाडा मुक्तिसंग्रामात रझाकार आणि निजामाच्या पोलिसांनी हर्सूल कारागृहात डांबलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना डबे पुरवण्यापासून त्यांचे संदेश बाहेर स्टेट काँग्रेसच्या नेत्यांना देण्यापर्यंत अनेक कामांत ते अग्रेसर राहिले.\nवैद्यकशास्त्रात पदवी मिळवलेले त्यांचे सुपुत्र डॉ. शंकरलाल पुरवार हे १९४५ मध्ये निजाम प्रांतीय व्यायाम परिषदेचे स्वागताध्यक्ष होते. ते उत्तम कवी तर होतेच; शिवाय त्या काळात महाराष्ट्रातील नावाजलेल्या साहित्यिकांशी त्यांचे उत्तम संबंध असल्याचे पत्रव्यवहारांतून दिसून येते. ऑल हैदराबाद फिजिकल एज्युकेशन कॉन्फरन्सचे ते सदस्य राहिले. सार्वजनिक गणेशोत्सवांत शहरात त्यांचा श्री गणेश भक्त मेळा आणि जय हिंद गणेश मंडळ प्रसिद्ध होते. या मेळ्यात गाण्यासाठी त्यांनी पदे लिहिली. त्यांतून देशभक्तीची भावना जागृत करण्याचे मोठे काम केले. शहरातील नाट्य चळवळीतही सक्रिय असलेल्या डॉ. शंकरलाल यांनी कचरदास बाकलीवाल, सतीश महाजन, धनराज सेठी यांच्या सहकार्याने ‘अभिनव नाट्य, औरंगाबाद’ ही संस्था स्थापन केली. त्यांच्या नाट्यप्रयोगांत कुसुमताई जोशी, शांतादेवी सदावर्ते, श्रीकांत सदावर्ते, त्र्यंबक महाजन, पुरुषोत्तमदास हौजवाला, वसंतराव हरसूलकर, पुंडलिकराव रांजणगावकर, नाथप्रसाद दीक्षित, नारायणदास श्रॉफ, बाबूराव महाजन आदी मंडळी उत्साहाने सहभागी होत. त्याशिवाय ते सर्वोदय आश्रमाचे चिटणीस, जिल्हा कुष्ठनिवारक मंडळाचे उपाध्यक्ष, औरंगाबाद आर्ट सोसायटीचे अध्यक्ष होते.\nडॉ. शांतीलाल यांचे इतिहासप्रेम\nपेशाने डॉक्‍टर असलेल्या या अवलियाने देशातून तस्करीमुळे बाहेर जाणाऱ्या १७ हजार पुराणवस्तू जमवून स्वतःच एक इतिहास रचला. संवेदनशील चित्रकार आणि शिल्पकार असलेल्या डॉक्‍टरांना १९६५ मध्ये डोळ्याला इजा झाल्यामुळे चित्रकला थांबवावी लागली. मग त्यांचे लक्ष वळले ते इतिहासाच्या जागोजाग विखुरलेल्या अनमोल रत्नांकडे नष्ट होणाऱ्या, छुपी विक्री सुरू असलेल्या पुराणवस्तूंचे पदरमोड करून पालकत्व घेण्यास सुरवात केली आणि संग्रहालयाच्या माध्यमातून नव्या पिढीला इतिहासाची ओळख करून दिली. सातवाहन, देवगिरीच्या यादवांपासून शिवकालीन इतिहासापर्यंत बरीच नवी माहिती समोर आली. महापालिकेने सुरू केलेल्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाला त्यांनी साडेतीन हजार वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत. पुरातत्त्व विभागाच्या सल्लागार समितीचे ते सदस्यही राहिले. आईच्या नावे त्यांनी सुरू केलेल्या मातोश्री कौशल्या पुरवार पुराणवस्तू संग्रहालयास दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, राष्ट्रपती झैलसिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या.\nमुले जपताहेत वारशाचा वसा\nचार दशकांच्या अथक परिश्रमांतून उभारलेल्या मातोश्री कौशल्या पुरवार पुराणवस्तू संग्रहालयासाठी स्वतंत्र इमारत असावी, अशी डॉ. शांतीलाल पुरवार यांची अखेरची इच्छा होती. अनेक थोरामोठ्यांनी आश्वासने दिली; पण त्यांच्या हयातीत भव्य संग्रहालयाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. सुमारे १७ हजार पुराणवस्तूंचा हा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी आता त्यांची मुले श्रीप्रकाश, जयेश आणि ओम प्रयत्नरत आहेत. मातोश्री कौशल्या पुरवार पुराणवस्तू संग्रहालयाची स्वतंत्र ओळख या तिघा भावांनी जपली आहे.\nजुन्या वाड्यातील खोल्यांत रचलेल्या या संग्रहालयासाठी त्यांनी घराच्याच जागेत मोठे दालन उभारले आहे. वडिलांच्या बरोबर सावलीसारखे राहिलेले ज्येष्ठ चिरंजीव श्रीप्रकाश हेदेखील उत्तम संग्राहक आहेत. संग्रहालयातील प्रत्येक वस्तूवर त्यांचे प्रेम आहे. महापालिकेच्या छत्रपत्री शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयात ठेवलेल्या सुमारे तीन हजार वस्तूंची ते आजही काळजी घेतात; तर ‘विश्‍वास ज्वेलर्स’ म्हणून सराफा व्यवसायात नाव कमावलेले जयेश आणि ओम हेदेखील घरातील संग्रहालयाच्या उभारणीत जातीने लक्ष घालतात.\nजिद्द, संघर्ष आणि सर्जनाचे दुसरे नाव म्हणजे आमचे बाबा\nबाबा भांड माझे वडील. त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांची आर्थिक स्थिती बेताचीच होती. आज आदर्श शिक्षक, प्रकाशक आणि साहित्यिक म्हणून त्यांचा परिचय आहे; पण हा प्रवास सहज नाही. या मागे त्यांचा खूप मोठा संघर्ष आहे. जिद्द आहे. नव्हे जिद्द, संघर्ष आणि सर्जनाचे दुसरे नाव म्हणजे आमचे बाबा. वर्ष १९७० मध्ये बाबांनी ‘लागे बांधे’ हे पहिले पुस्तक लिहिले. त्याच्या प्रकाशनासाठी त्यांनी पुणे-मुंबईच्या प्रकाशकांकडे चकरा मारल्या; मात्र कोणीही प्रकाशनासाठी तयार झाले नाही. तेव्हा बाबांचे गुरू भालचंद्र नेमाडे म्हणाले, ‘‘तूच तुझ्या पुस्तकाचा प्रकाशक हो’’ झालं. हा गुरुमंत्र घेऊन एका शिक्षकाने प्रकाशन विश्‍वात पाऊल ठेवले. १९७४ मध्ये ‘धारा’चा जन्म झाला. तेव्हा त्यांनी धारा प्रकाशन सुरू केले. या अंतर्गत त्यांनी आपले पहिले पुस्तक प्रकाशित केले. पुढे १९८० ला माझा जन्म झाला. त्यानंतर त्यांनी ‘साकेत’ प्रकाशन सुरू केले. या काळात त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. आईवर घरखर्चाची जबाबदारी आली. आज ‘साकेत’ प्रकाशनाची महती सांगायला नको. या माध्यमातून बाबांनी नवलेखकांना लिहिते केले. त्यांना व्यासपीठ दिले. एवढेच नाही तर या क्षेत्रात पुणे-मुंबईच्या व्यावसायिकांची मक्तेदारी मोडीत काढली. त्यांच्यासोबत माझे वडील मुलाचेच नाही तर ते माझे सर्वांत बेस्ट फ्रेण्ड आहेत.\n- साकेत बाबा भांड (शब्दांकन - प्रकाश बनकर)\nआमचे बाबा संस्कारांची शिदोरीच\nआयुष्यात प्रत्येकाचे महत्व वेगवेगळे असते. मुलांवर खऱ्या अर्थाने संस्कार करीत घडविण्याचे काम आई करीत असते. तर वडिलांच्या वागणुकीतून मुले शिकत असतात. कळत नकळत मुलांवर वडीलांच्या वागणुकीचा परिणाम होतोच. माझ्याही जीवनावर वडिलांचा (माजी खासदार बाळासाहेब पवार) मोठा प्रभाव पडलेला आहे. समाजकारण, राजकारणात वावरत असताना त्यांनी स्वाभिमानाने घेतलेले निर्णय समाजातील अनेक प्रश्‍न सोडविण्यास कामी आले. आपण संकटात लोकांच्या कामी यायला हवे, या भावनेतून ते सतत प्रयत्नशील असत. हे करीत असताना त्यांनी कायम नीतिमूल्य जपली, याचा माझ्यावर प्रभाव पडलेला आहे. आम्ही भावंडं वेगळ्या क्षेत्रांत, व्यवसायांत असलो तरी त्यांच्या शिकवणीमुळेच बऱ्यापैकी नाव कमवू शकलो. सहकार, शिक्षण, यासह सामाजिक क्षेत्रात मोठ्या संस्था उभ्या केल्या; मात्र वडिलांच्या काही राहून गेलेल्या गोष्टी पूर्ण करण्याची संधी मला मिळाली. ते काम मी पूर्ण करू शकलो, ही माझ्या आयुष्यातली सर्वात आनंदाची, अविस्मरणीय बाब आहे. वडीलांचे कार्य हेच सतत प्रेरणा देणारे ठरले. पदोपदी त्यांची आठवण येते. एकही दिवस त्यांच्या आठवणींविना जात नाही. त्यांच्या शिकवणीमुळेच आलेल्या आव्हानांना आम्ही सहज तोंड देऊ शकलो. त्यांनी गाजवलेले कर्तृत्व, त्यांची उंची आम्ही गाठू शकणार नाहीत; मात्र त्यांनी चालायला शिकविलेल्या रस्त्यावर चालणे सुकर झाले. त्यानुसार वाटचाल करीत असून चांगले संस्कारी जीवन जगत आहोत. आईचे संस्कार, वडीलांची शिकवण पावलोपावली जपत वाटचाल करीत आहोत.\n- मानसिंग पवार, उद्योगपती (शब्दांकन - राजेभाऊ मोगल)\nवडिलांनी दिला ज्ञानदानाचा वसा\nशिक्षण कमी, हलाखीची परिस्थिती, त्यातच घराची जबाबदारी... या सगळ्यांत शिक्षणाचे महत्त्व त्यांनी लहानपणीच जाणले. ते म्हणतात, ‘माणूस घडविणे हे केवळ बोलण्यापुरते ठीक आहे; मात्र स्वतः घडून इतरांना घडविणे हे खरे जगणे होय.’ त्यांचे नाव प्रभुलाल तोनगिरे.\nजिल्हा परिषद शाळेतून निवृत्तीनंतर आजही तोनगिरे गुरुजी हे नाव आदराने घेतले जाते. शाळेत त्यांच्या शिस्तीचा जितका दरारा, तिततेच ते विद्यार्थिप्रिय. भडकलगेटच्या तत्कालीन मल्टीपर्पज शाळेत त्यांनी शिक्षण घेतले. सकाळच्या वेळेत वीटभट्टीवर काम करून दुपारच्या वेळेत पदमपुरा येथून शाळेत ते चालत जात. यातूनच आपण जगण्याचा पहिला धडा घेतल्याची भावना ते व्यक्त करतात.\nवडिलांचा शिक्षकी पेशा स्वीकारलेल्या त्यांच्या कन्या सुमित्रा सांगतात, ‘‘बाबांचे कष्ट आणि शिकविण्याची तळमळ यातून आपणाला शिक्षणाचे महत्त्व कळले. मी शिक्षण घ्यावे ही बाबांची इच्छा. मीही शिक्षिका व्हायचे ठरविले होतेच. तेव्हा मुली फार-फार तर दहावीपर्यंत शिकायच्या. बाबांनी डीएडचे शिक्षण घेताना घरखर्च कमी करत माझी फीस भरली. त्यांचा वारसा जपल्याचे स्वप्न साकार झाल्याची भावना आजही बापलेकीच्या नात्याला उजाळा देते.’’ तोनगिरे गुरुजींनंतर ‘तोनगिरे मॅडम’ या नावाने सुमित्रा यांना ओळखले जाते. त्या जिल्हा परिषदेच्या शरणापूर येथील शाळेत २१ वर्षांपासून कार्यरत आहेत.\nतोनगिरे गुरुजी आज ७५ वर्षांचे आहेत. या वयातही ‘कलगीतुऱ्या’चा छंद त्यांनी तितक्‍याच नेटाने जोपासला आहे. लोप पावत चाललेल्या कलगीतुऱ्याला ऊर्जितावस्था देण्यासाठी ‘कलगीतुरा पार्टी’ तयार करणे, स्पर्धा भरविणे अशा कार्यांत तब्बल २५ वर्षांपासून गुरुजी अग्रेसर आहेत.\n- सुमित्रा प्रभुलाल तोनगिरे (शब्दांकन - सुषेन जाधव)\nKerala Floods : केरळमध्ये मदतीसाठी 38 हेलिकॉप्टर, शेकडो बोटी\nकोची : केरळमध्ये यंदाच्या शतकातील सर्वांत मोठी पूर आला असून, पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी तब्बल 38 हेलिकॉप्टर आणि शेकडो बोटी कार्यरत आहेत...\nMaratha Kranti Morcha : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री आंदोलन\nपुणे : मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे सोमवारपासून (ता.20) मराठा आरक्षणासाठी आणि विविध मागण्यांसाठी पुणे विभागीय आयुक्त...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nभाषणात मोठी ताकद आहे.. : बबन साळगांवकर\nसावंतवाडी : भाषणात मोठी ताकद आहे त्याच वक्तृत्वाचा फायदा घेऊन तब्बल 23 दिवसांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे पहिल्यांदा आमदार बनले आणि त्यांनी नंतर...\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.vicharyadnya.com/2010/11/muktisathi-parameshwaras-prarthana.html", "date_download": "2018-08-18T10:34:51Z", "digest": "sha1:LJPGBOAI6BKHQH6SQYD44JMFYKGLX4PK", "length": 5487, "nlines": 47, "source_domain": "www.vicharyadnya.com", "title": "प्रार्थना: मुक्तीसाठी परमेश्वरास प्रार्थना", "raw_content": "\nप्रार्थना: मुक्तीसाठी परमेश्वरास प्रार्थना\nधर्म काय आणि अधर्म काय , सत्य काय आणि असत्य काय, नीती काय आणि अनीती काय, भूत, भविष्य, वर्तमान काय,\nयोग्य काय आणि अयोग्य काय, पाप काय आणि पुण्य काय, कारण,कार्य,आणि परिणाम काय, कर्तव्य काय आणि अकर्तव्य काय, संचित,प्रारब्ध आणि क्रियमाण काय, कर्ता, भोक्ता आणि कर्म काय, या सगळ्याचे मर्म सहज ज्ञात असणाऱ्या परममाता आणि परमपिता परमेश्वरास आत्यंतिक कळवळून अखंड हीच प्रार्थना माझे व माझ्या सर्वस्वाचे रक्षण करावे आणि मला सगळ्या कैदेतून, बंधनांतून मुक्त करावे, मुक्त करावे, अभय द्यावे, अभय द्यावे.\nस्तोत्र: राम एक सर्वसमर्थ\nप्रार्थना: नमन तुजला हे गजानना\nगणपती उजव्या सोंडेचा की डाव्या - भ्रम, भीती, आणि वास्तव\nगणेश पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे सगळे खरे आहे का\nसोवळे-ओवळे ही फसवणूक कुणाची\nसोवळे मोडले या विषयावरून फसवणुकीचा गुन्हा आणि पुढचे वाद सध्या सुरु आहेत. याविषयावर मनात सोवळ्या ओवळ्याच्या विश्वास व वादांवर काही मूलभूत प्रश्न उठले. त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात आहे. या पोस्टचा उद्देश केवळ एका विशिष्ट घटनेवर चर्चा करण्याचा नाही त्यामुळे कृपया कुठलेही मत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी मानू नये.\nकाल काय लिहावं सुचत नव्हतं. त्यावेळी माझ्या कवितेनेच मला प्रेरणा दिली. ती प्रेरणाच आजची कविता \"कविता हृदयात वसणारी\"\nप्रतिमा: कृष्णमोहिनी प्रतिमा ब्लॉगसंग्रहातून\nमी कविता तुझ्या हृदयात वसणारी\nकॉपीराईट: या ब्लॉग वरील सर्व कविता व लेख यांचे सर्वाधिकार ब्लॉग लेखिकेकडे सुरक्षित. या ब्लॉगवरील कुठलाही कन्टेन्ट इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट माध्यमात पुनर्प्रकाशित करण्यापूर्वी लेखिकेची लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे. ©️ मोहिनी पुराणिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%A8%E0%A5%AE_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-08-18T09:58:23Z", "digest": "sha1:ERJPA4O43MMMIV63RI5EBDBJ3VX6HWZG", "length": 3859, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १४२८ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १४२८ मधील जन्म\n\"इ.स. १४२८ मधील जन्म\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १३:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/chiplun-konkan-news-ramesh-kadam-rehabilitation-stop-54136", "date_download": "2018-08-18T10:45:28Z", "digest": "sha1:G4WI2WZBL5WJXLN4RLZOEMPHJCLAU73D", "length": 16445, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "chiplun konkan news ramesh kadam rehabilitation stop भाजपमध्ये रमेश कदमांचे पुनर्वसन रखडले | eSakal", "raw_content": "\nभाजपमध्ये रमेश कदमांचे पुनर्वसन रखडले\nबुधवार, 21 जून 2017\nकार्यकर्ते अस्वस्थ - ‘ना घर का, ना घाट का’ अशी अवस्था\nचिपळूण - राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये गेलेले चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांचे पक्षात अद्याप पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे रमेश कदम समर्थक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीत थांबायचे तर हा पक्ष सत्तेत नाही, रमेश कदमांबरोबर जायचे, तर सत्ताधारी पक्षात कोणी विचारत नाही, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.\nकार्यकर्ते अस्वस्थ - ‘ना घर का, ना घाट का’ अशी अवस्था\nचिपळूण - राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये गेलेले चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांचे पक्षात अद्याप पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे रमेश कदम समर्थक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीत थांबायचे तर हा पक्ष सत्तेत नाही, रमेश कदमांबरोबर जायचे, तर सत्ताधारी पक्षात कोणी विचारत नाही, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.\nपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडण्याचे अधिकार रमेश कदमांना मिळाले; मात्र ४० वर्षे पालिकेवर असलेले कदमांचे वर्चस्व या वेळी संपुष्टात आले. शिवसेनेचे ११ नगरसेवक निवडून आल्यामुळे या पक्षाने पालिकेत मोठा गट तयार केला; मात्र नगराध्यक्ष भाजपचा निवडून आला.\nशिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला जवळ केले. दोन्ही काँग्रेसने भाजपला शहराच्या विकासासाठी पाठिंबा दिला. याच दरम्यान रमेश कदमांनी राष्ट्रवादीतील सर्व पदांचा त्याग करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईत झालेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी चिपळूण शहर आणि ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी गेले होते. पक्षप्रवेशानंतर कोणत्याच हालचाली होत नसल्यामुळे काहीजण पुन्हा राष्ट्रवादीत, तर काहीजण शिवसेनेत सक्रिय झाले आहेत.\nचिपळूण विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे; मात्र या मतदारसंघात कदमांची वैयक्तिक राजकीय ताकद आहे. शिवसेनेला रोखण्यासाठी भाजप रमेश कदमांना मोठी जबाबदारी देऊन पक्षबांधणीसाठी प्रयत्न करेल. त्यातूनच भाजप आणि रमेश कदम समर्थकांना चांगले दिवस येतील, असे वाटले होते; मात्र कदमांना ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत ठेवण्यात आले आहे. पालिकेत पाणी सभापतिपद हे कदम समर्थक नगरसेविकेला मिळाले. हा अपवाद सोडला त्यांच्या अन्य कार्यकर्त्यांना पक्षाची पदेही मिळालेली नाहीत. पालिकेतील सत्ताधारी पालिकेच्या कारभारात कदमांना फारसे महत्त्व देत नसल्याचे दिसते. त्यांना विश्‍वासात न घेताच पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे कदम समर्थकांची अस्वस्थता वाढली आहे.\nमाजी नगरसेवक महंमद फकीर यांनी कदमांबरोबर मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला होता. नुकत्याच झालेल्या पालिकेच्या पोटनिवडणुकीत त्यांनी आपल्या पत्नीला शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आणले. कदमांचे कट्टर समर्थक श्रीकृष्ण खेडेकर पुन्हा राष्ट्रवादीत सक्रिय झाले आहेत. प्रभाग ९ च्या पोटनिवडणुकीत ते राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसले. अशीच अवस्था ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची झाली आहे.\nसत्तेशिवाय कार्यकर्ते टिकवणे अवघड असते. पदाशिवाय राजकारण नाही, कदमांना पक्षाने मोठी जबाबदारी द्यावी. महामंडळ किंवा शासकीय समितीचे सदस्यपद द्यावे, अशी मागणी पक्षाकडे करण्यात आली आहे. आमचा पाठपुरावा चालू आहे. लवकर निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.\n- बाळ माने, जिल्हाध्यक्ष, भाजप\nसिद्धूचे पाक लष्करप्रमुखांना अलिंगन\nनवी दिल्ली : पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला काँग्रेसचे नेते व भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांना खास आमंत्रण होते....\nKerala Floods : केरळमध्ये मदतीसाठी 38 हेलिकॉप्टर, शेकडो बोटी\nकोची : केरळमध्ये यंदाच्या शतकातील सर्वांत मोठी पूर आला असून, पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी तब्बल 38 हेलिकॉप्टर आणि शेकडो बोटी कार्यरत आहेत...\nएमआयएम नगरसेवक मतीन यांना अटक\nऔरंगाबाद- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला नकार देणारे औरंगाबादमधील एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना आज अटक करण्यात...\nभाषणात मोठी ताकद आहे.. : बबन साळगांवकर\nसावंतवाडी : भाषणात मोठी ताकद आहे त्याच वक्तृत्वाचा फायदा घेऊन तब्बल 23 दिवसांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे पहिल्यांदा आमदार बनले आणि त्यांनी नंतर...\nपंकज भूसे यांचा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव\nसरळगांव - महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी होऊन दिलेल्या उद्दिष्टा पेक्षा जास्त वृक्ष लागवड करून उत्कृष्ट कामगिरी केल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-school-50976", "date_download": "2018-08-18T10:45:15Z", "digest": "sha1:YGFHHVCANVSPGGBJCDXJIWBFC6TP4QAE", "length": 12296, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur news school शालोपयोगी वस्तूंमध्येही ‘बाहुबली’ची चलती | eSakal", "raw_content": "\nशालोपयोगी वस्तूंमध्येही ‘बाहुबली’ची चलती\nबुधवार, 7 जून 2017\nसोलापूर- शाळा सुरू होण्यास अवघा एक आठवडा शिल्लक आहे. त्यामुळे बाजारातही पालकांची आणि बच्चे कंपनीची खरेदीसाठी गर्दी होत आहे. बाहुबली चित्रपटाची क्रेझ बच्चे कंपनीत असल्याचे दिसून येत आहे. बाहुबलीच्या प्रतिमा असलेल्या वस्तूंना विद्यार्थ्यांकडून मागणी आहे.\nसोलापूर- शाळा सुरू होण्यास अवघा एक आठवडा शिल्लक आहे. त्यामुळे बाजारातही पालकांची आणि बच्चे कंपनीची खरेदीसाठी गर्दी होत आहे. बाहुबली चित्रपटाची क्रेझ बच्चे कंपनीत असल्याचे दिसून येत आहे. बाहुबलीच्या प्रतिमा असलेल्या वस्तूंना विद्यार्थ्यांकडून मागणी आहे.\nपुढील आठवड्यात शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे शाळांमध्ये तयारी सुरू आहे. तसेच बाजारात दप्तर, वह्या, कंपास, रंगाचे खडू, चित्रकलेच्या वह्या, प्रयोगाच्या वह्या तसेच अनेक शालोपयोगी वस्तू बाजारात दुकानदारांनी विक्रीसाठी ठेवल्या आहेत. तसेच डबा, मुलांना आवडणारी चित्रे, विविध कार्टून असलेल्या वॉटर बॅग, फॅन्सी पेन्सिलही बाजारात आल्या आहेत. याशिवाय १००, २०० पानी तसेच त्याहूनही मोठ्या वह्यांची विक्री होत आहे. जगातील विविध आश्‍चर्ये, वैज्ञानिक सिद्धांत, गणितातील गमती अशी माहिती मुखपृष्ठावर असणाऱ्या वह्यांच्या विक्रीला विद्यार्थ्यांची अधिक पसंती असल्याचे दिसून येत आहे. तसेच कंपास, विज्ञान विषयासाठी लागणाऱ्या साहित्यालाही मागणी आहे.\nशहरातील नवी पेठ, विजापूर रस्ता, शेळगी, आसरा चौक, लष्कर आदी परिसरातील शालेय साहित्याच्या दुकानात पालक तसेच विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे.\nशालेय साहित्याच्या खरेदीस ग्राहक गर्दी करीत आहेत. बच्चे कंपनीकडून कार्टून तसेच विविधरंगी चित्रे असलेल्या वस्तूंची मागणी होत आहे. मात्र, दरवर्षीपेक्षा यंदा बाजारात सध्या तरी मंदी असल्याचे दिसत आहे.\n- श्रीनिवास कुंदूर, दुकानदार\nसिद्धूचे पाक लष्करप्रमुखांना अलिंगन\nनवी दिल्ली : पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला काँग्रेसचे नेते व भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांना खास आमंत्रण होते....\nKerala Floods : केरळमध्ये मदतीसाठी 38 हेलिकॉप्टर, शेकडो बोटी\nकोची : केरळमध्ये यंदाच्या शतकातील सर्वांत मोठी पूर आला असून, पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी तब्बल 38 हेलिकॉप्टर आणि शेकडो बोटी कार्यरत आहेत...\n'एक धागा शौर्य' का सैनिकांसाठी जुन्नरच्या विद्यार्थ्यांनीचा अभिनव उपक्रम\nजुन्नर - सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांसाठी जुन्नरच्या शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थिनींनी 'एक धागा शौर्य'का हा अभिनव...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/buldhana-news-sand-slide-one-dead-accident-48417", "date_download": "2018-08-18T10:43:10Z", "digest": "sha1:W5ASM5UAPU2HTBL3NY63D7BMWHPLRRYT", "length": 10677, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "buldhana news sand slide one dead, accident बुलडाणा : रेतीची दरड कोसळून १ ठार, १ गंभीर | eSakal", "raw_content": "\nबुलडाणा : रेतीची दरड कोसळून १ ठार, १ गंभीर\nरविवार, 28 मे 2017\nमन नदीची दरड ही 30 ते 35 फूट उंच असतांना तहसील प्रशासनाने ह्या गंभीर बाबीकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले आहे.\nशेगाव : बुलडाणा जिल्ह्यातील लोहारा येथील मन नदीत रेतीची दरड कोसळून १ ठार १ गंभीर झाल्याची घटना आज दुपारी ३ वाजता बाळापूर तालुक्यातील लोहारा हद्दीत घडली.\nबाळापूर तालुक्यातील लोहारा येथे आज दुपारी २ मजूर मन नदीच्या रेती घाटात रेतीचा उपसा करीत असतांना त्यांच्या अंगावर अचानक रेतीची दरड कोसळून झालेल्या अपघातात मानेगाव येथील गोकुळ नराळे (वय ३२) हा जागीच ठार झाला असून, विजय चौधरी (वय ३५) हा गंभीर जखमी झाला आहे.\nचौधरी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली आहे याप्रकरणी शेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मन नदीची दरड ही 30 ते 35 फूट उंच असतांना तहसील प्रशासनाने ह्या गंभीर बाबीकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे बाळापूर तहसीलदारांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी मानेगाव येथील नागरिकांनी केली आहे\nKerala Floods : केरळमध्ये मदतीसाठी 38 हेलिकॉप्टर, शेकडो बोटी\nकोची : केरळमध्ये यंदाच्या शतकातील सर्वांत मोठी पूर आला असून, पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी तब्बल 38 हेलिकॉप्टर आणि शेकडो बोटी कार्यरत आहेत...\nपिंपरी - दोन मुलांना मारून वडिलांची आत्महत्या\nपिंपरी (पुणे) - दोन मुलांना मारून वडिलांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना शनिवारी दुपारी ताथवडे येथे घडली. शुभम बर्मन (वय १०) रूपम वर्मा (वय...\nएमआयएम नगरसेवक मतीन यांना अटक\nऔरंगाबाद- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला नकार देणारे औरंगाबादमधील एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना आज अटक करण्यात...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95-2/", "date_download": "2018-08-18T10:56:17Z", "digest": "sha1:WOUYUHIBVKQ5I5NLKP72BVUWD5XVS3BT", "length": 14478, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा नाही; मात्र, भाजपला शह देण्यासाठी देश पिंजून काढणार – शरद पवार - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे…\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची…\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Notifications पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा नाही; मात्र, भाजपला शह देण्यासाठी देश पिंजून काढणार – शरद...\nपंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा नाही; मात्र, भाजपला शह देण्यासाठी देश पिंजून काढणार – शरद पवार\nमुंबई, दि. ६ (पीसीबी) – संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) प्रमुख सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि मला २०१९ मध्ये पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा नाही. मात्र आम्ही एकत्र येण्यास तयार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी म्हटले आहे. देश पिंजून काढून भाजपला शह देण्यासाठी विरोधकांना एकत्र आणून जनतेला आत्मविश्वास देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही पवार यांनी म्हटले आहे.\nPrevious articleतुम्हालाही मुस्लीम बनवून दाढी ठेवायला लावू; ओवैसींची धमकी\nNext articleअचानक छातीत दुखू लागल्याने छगन भुजबळ रूग्णालयात दाखल\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nवाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची...\nपुण्यातील रॅमी ग्रँड या पंचतारांकित हॉटेलात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश;...\nदिवसभर चा थकवा दादा कोंडकेंचा हा विडीयो पाहुन घालवा 😇😎\nपिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचा शब्द भाजपने पाळला – पालकमंत्री गिरीष बापट...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमाझ्यावरील हल्ला म्हणजे मॉब लिंचिंगचा प्रकार – खासदार हिना गावित\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/component/tags/tag/2018", "date_download": "2018-08-18T10:35:23Z", "digest": "sha1:G75Z272V3NTBFNSH5Y6M3JSMHA6267W7", "length": 5003, "nlines": 159, "source_domain": "marathicineyug.com", "title": "2018 - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'झी नाट्य गौरव २०१८' वर “संगीत देवबाभळी” ची मोहोर\n'भरत जाधव' यांनी 'झी नाट्य गौरव पुरस्कार' सोहळ्यात पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान\n'संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१८' मध्ये 'नकळत सारे घडले' ठरली सर्वोत्कृष्ट मालिका\n‘१८ व्या संस्कृती कलादर्पण नाट्य महोत्सवा’ ला रसिकांचा दमदार प्रतिसाद\n\"झी चित्र गौरव २०१८\" पुरस्कारांची नामांकने जाहीर\n\"झी नाट्य गौरव २०१८\" पुरस्कारांची नामांकने जाहीर\n१८ व्या संस्कृती कलादर्पण पुरस्काराची नामांकने जाहीर\n१८ व्या संस्कृती कलादर्पण व्यावसायिक नाट्य स्पर्धेचा प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर\nसंस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१८ दिमाखात संपन्न - विजेत्यांची नावे\nस्टार प्रवाहवर अनुभवा तडका मराठी मनोरंजनाचा - 'संस्कृती कला दर्पण' सोहळा १० जूनला\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\nतीच धम्माल मस्ती घेऊन पुन्हा येतोय 'बॉईज 2' ५ ऑक्टोबरपासून\n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेमधील हरहुन्नरी लक्ष्मी म्हणजेच अभिनेत्री 'समृद्धी केळकर' झाली \"कथ्थक विशारद\"\n'अमेय वाघ' करणार 'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स' चं सूत्रसंचालन\n\"अंजली स्वीकारणार सईचं आव्हान\" - पहा 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेचा २ तासांचा विशेष भाग १९ ऑगस्टला\nSony Pictures Network चे मराठी मनोरंजन क्षेत्रातले पहिले पाऊल - Sony मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-18T10:53:22Z", "digest": "sha1:RXKPNDPMCY2LONWK52LTJTA64GCMNBM4", "length": 8333, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे : टीपी स्कीममधील शंका दूर करू – गित्ते | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे : टीपी स्कीममधील शंका दूर करू – गित्ते\nपुणे – म्हाळुंगे-माण टीपी स्कीमध्ये पायाभूत सुविधांची कामे व अंतिम प्लॉट जमिनमालकांच्या नावे करण्याचे काम 15 महिन्यात पूर्ण करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कटीबध्द आहे. या टीपी स्कीमबाबत ग्रामस्थांच्या मनात काही शंका असल्यास त्याचे निरसन करण्यात येईल, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.\nम्हाळुंगे-माण टीपी स्कीम महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 196 मधील तरतुदीनुसार प्रसिध्द करण्यात आली आहे. ही योजना सर्व कायदेशीर बाबींचे पालन करून व सर्व ग्रामस्थांना विश्‍वासात घेऊनच तयार करण्यात आली आहे. म्हाळुंगे-माण टीपी स्कीमध्ये पायाभूत सुविधांची कामे व अंतिम प्लॉट जमिनमालकांच्या नावे करण्याचे काम 15 महिन्यात पूर्ण करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कटीबध्द आहे.\nया करिता जमिनधारकांसोबत करारनामा करण्याचे ठरले आहे. नगर रचना योजनेबाबत शेतकऱ्यांसोबत बैठका घेण्यात आल्या आहेत. या योजनेची सर्वंकष माहिती, होणारे फायदे, सविस्तरपणे शेतकऱ्यांना समाजावून सांगण्यात आले आहे. तसेच सर्व शेतकऱ्यांच्या जमिनींचे हिस्से अथवा आकार याबाबत माहिती घेऊन जमिनधारकांना सर्व एफएसआय वापरता येण्याजोगा भूखंड देण्यात आलेला आहे. त्याचा समावेश करून प्रारूप टीपी स्कीम तयार करण्यात आलेली असल्याचे प्राधिकरणाचे आयुक्त गित्ते यांनी सांगितले.\nशेतकऱ्यांना याविषयी काही शंका असल्यास प्राधिकरणाकडून त्यांचे निरसन करण्यात येईल. जमिनधारकांस टीपी स्कीम योजनेबाबत लेखी सूचना द्यावयाच्या असल्यास ते प्राधिकरणाकडे दाखल करू शकतात, असेही गित्ते यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराष्ट्रकुल स्पर्धा ; भारताच्या नीरज चोप्राची भालाफेकमध्ये सुवर्ण कामगिरी\nNext articleसातारा शहरातील वाहतुकीत बदल\nसारथी उपक्रमातून 5 लाख लोकांचे शंका निरसन\nपुणे – दोनशेहून अधिक जणांकडून दावे दाखल\n“भुक मुक्त’ पुण्यासाठी स्मार्ट सिटीचा पुढाकार\nकचरा प्रकल्पांची क्षमता वाढवा\n24 तासांमध्ये मिळणार वीजग्राहकांना संपूर्ण माहिती\nअजित पवार यांनी घेतला जिल्हा परिषदेच्या कारभाराचा आढावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-farmer-mundan-loanwaiver-51634", "date_download": "2018-08-18T10:39:04Z", "digest": "sha1:4UPNXI4RS4S3LKKAZT6LDFBAYCTPUEW4", "length": 13311, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news farmer mundan for loanwaiver शेतकऱ्याचे मुंडण; भाजपचे खंडन | eSakal", "raw_content": "\nशेतकऱ्याचे मुंडण; भाजपचे खंडन\nशनिवार, 10 जून 2017\nमुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात कॉंग्रेस-भाजप आमनेसामने\nमुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात कॉंग्रेस-भाजप आमनेसामने\nनागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात सतीश चौधरी या शेतकऱ्याने मुंडण करून सरकाचा निषेध नोंदवला. त्याचवेळी भाजप नेत्यांनी कॉंग्रेसच्या विरोधात आणि सरकारच्या समर्थनार्थ जोरदार निदर्शने करत सरकारविरोधातील आरोपांचे खंडन केले. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत दोन्ही पक्षांमध्ये जवळपास तीन तास जुगलबंदी रंगली.\nहिंगणा तालुका कॉंग्रेस कमिटी व शेतकऱ्यांच्या नेतृत्वात \"भाजप सरकार हाय हाय', \"शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे', \"शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर ढोंग करणे बंद करा' अशी जोरदार घोषणाबाजी करत आज आंदोलन केले. दोन दिवसांत कर्जमाफी संदर्भात निर्णय घेतला नाही, तर पेटून उठण्याचा इशाराही देण्यात आला. सरसकट कर्जमाफीसह शेतमालाला हमीभाव, कृषिपंपाचे वीजदेयक माफ करावे, मोफत बी-बियाण्यांचा पुरवठा करावा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पेन्शन लागू करावी, यासारख्या काही मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.\nभाजपनेदेखील याच परिसरात सरकारच्या समर्थनार्थ निदर्शने केली व विकासकामांचा पाढा वाचून दाखविला. या निदर्शनांमुळे घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांचीही चांगलीच दमछाक झाली. कुंदा राऊत यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसने आंदोलन केले. तर जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार व आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात भाजपने निदर्शने केली.\nआपला खरा चेहरा जनतेसमोर येईल या भीतीने आंदोलन करण्याची भाजपवर वेळ आली. विकासकामे केली असली, तर आंदोलन करून सांगण्याची गरज पडली नसती, अशी टीका कुंदा राऊत यांनी केली. भाजप आंदोलन करत नसून सरकारची खरी कामे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, हीच आमची भूमिका आहे, या शब्दांत पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार यांनी प्रत्युत्तर दिले. दरम्यान, भाजपतर्फे फेटरी येथील चौकात राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याबद्दल अभिनंदनाचे फलक लावले होते. त्यामुळे कर्जमाफी जाहीर होण्यापूर्वीच लागलेल्या या फलकांची परिसरात जोरदार चर्चा होती.\nKerala Floods : केरळमध्ये मदतीसाठी 38 हेलिकॉप्टर, शेकडो बोटी\nकोची : केरळमध्ये यंदाच्या शतकातील सर्वांत मोठी पूर आला असून, पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी तब्बल 38 हेलिकॉप्टर आणि शेकडो बोटी कार्यरत आहेत...\nपिंपरी - दोन मुलांना मारून वडिलांची आत्महत्या\nपिंपरी (पुणे) - दोन मुलांना मारून वडिलांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना शनिवारी दुपारी ताथवडे येथे घडली. शुभम बर्मन (वय १०) रूपम वर्मा (वय...\nएमआयएम नगरसेवक मतीन यांना अटक\nऔरंगाबाद- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला नकार देणारे औरंगाबादमधील एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना आज अटक करण्यात...\nभाषणात मोठी ताकद आहे.. : बबन साळगांवकर\nसावंतवाडी : भाषणात मोठी ताकद आहे त्याच वक्तृत्वाचा फायदा घेऊन तब्बल 23 दिवसांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे पहिल्यांदा आमदार बनले आणि त्यांनी नंतर...\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/sports-news-ravi-shastri-cricket-58556", "date_download": "2018-08-18T10:51:38Z", "digest": "sha1:TCRFPK2VXYUGEQRS5W4ICOEZ7QJRQKZQ", "length": 12839, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news Ravi Shastri cricket रवी शास्त्रींचेच पारडे जड | eSakal", "raw_content": "\nरवी शास्त्रींचेच पारडे जड\nसोमवार, 10 जुलै 2017\nमुंबई - भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत ‘बीसीसीआय’ची नियुक्त सल्लागार समिती केवळ सहा जणांच्याच मुलाखती घेणार असून, यात माजी संघ संचालक रवी शास्त्री यांचे पारडे जड मानले जात आहे.\nमुंबई - भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत ‘बीसीसीआय’ची नियुक्त सल्लागार समिती केवळ सहा जणांच्याच मुलाखती घेणार असून, यात माजी संघ संचालक रवी शास्त्री यांचे पारडे जड मानले जात आहे.\nया पदासाठी ‘बीसीसीआय’केड शास्त्री यांच्यासह वीरेंद्र सेहवाग, टॉम मूडी, रिचर्ड पिबस, डोड्डा गणेश, लालचंद राजपूत, लान्स क्‍लुसनेर, राकेश शर्मा (ओमानचे प्रशिक्षक), फिल सिमन्स या क्रिकेटमधील व्यक्तींसह नाशिकचे अभियंता उपेंद्रनाथ ब्रह्मचारी असे दहा जणांचे अर्ज आले. निवड समिती यापैकी सहा जणांचीच मुलाखत घेणार असून, यात शास्त्री, सेहवाग, मूडी, सिमन्स, पिबस, राजपूत यांच्या समावेशाची शक्‍यता आहे. क्‍लुसनेर यांचे नाव राखीव यादीत ठेवले जाण्याची शक्‍यता आहे.\nभारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा एक वर्षाचा करार संपल्यानंतर अनिल कुंबळे यांनी विंडीज दौऱ्यातूनच या पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होते. कुंबळे आणि कोहली यांच्यातील कथित अंतर्गत संघर्षानंतर या वेळी नव्या प्रशिक्षकाची मुदत दोन वर्षांची ठेवली जाईल.\nप्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्त्री कधीच नव्हते. जेव्हा ‘बीसीसीआय’ने अर्ज पाठविण्याची मुदत वाढवून दिली, तेव्हा त्यांनी अर्ज भरला. शास्त्री यांनी अर्ज भरल्यापासून त्यांचेच पारडे जड मानले जाऊ लागले. कर्णधार कोहलीबरोबर त्यांचा जुळून आलेला समन्वय हे त्यामागचे प्रमुख कारण ठरू शकते. अर्थात, शास्त्री यांच्या नावाला गांगुली किती पाठिंबा देतात, यावर बरेच काही अवलंबून राहील. यापूर्वी प्रशिक्षकपदासाठी झालेल्या मुलाखतीत शास्त्री यांनी स्काइपवरून दिलेल्या मुलाखतीला गांगुली यांनी आक्षेप घेतला होता. शास्त्री या पदासाठी गंभीर असतील तर त्यांनी मुलाखतीला यायला हवे, असे गांगुली म्हणाले होते; पण या वेळी परदेशी उमेदवारांच्या मुलाखती या अशाच पद्धतीने होणार असल्याची चर्चा आहे.\nपावसमध्येही होमिओपॅथिक हॉस्पिटल उभारू - राऊत\nरत्नागिरी - हार-तुऱ्यांसाठी आमची पदे नाहीत. जनसेवेची आमची भूमिका आहे. १०० टक्के समाजकार्य करून तुमचे आशीर्वाद मिळविण्यातच आम्हाला धन्यता मिळते....\nAtal Bihari Vajpayee : अटलबिहारी वाजपेयींना पुणेकरांची श्रद्धांजली\nपुणे - पुण्याबरोबरील ऋणानुबंध जतन करणारे माजी पंतप्रधान अटलबिहरी वाजपेयी यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पुणेकरांनी शुक्रवारी श्रद्धांजली...\n#ToorScam तूरडाळ गैरव्यवहारात फौजदारी गुन्हे रोखले\nमुंबई - राज्यात तूरडाळ गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत असतानाच संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी...\nबैलाने तोरण मारण्याचा शर्यती बिदाल मध्ये उत्साहात संपन्न\nमलवडी : बिदाल (ता. माण) येथे महाराष्ट्रातील एकमेव बैलाने तोरण मारण्याच्या शर्यती मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील '...\nनवी दिल्लीः भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुढाकारामुळेच भारताचा पाकिस्तान दौरा ऐतिहासिक ठरला. पाकिस्तानच्या हद्दीत टीम इंडियाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/hamlet-drama-belgav-pune-44047", "date_download": "2018-08-18T10:51:13Z", "digest": "sha1:AILS7PH4ME2WYVVKQXOBLCTZDNBDTFBF", "length": 12606, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "hamlet drama belgav & pune ‘हॅम्लेट’चे आता बेळगाव, पुण्यात प्रयोग | eSakal", "raw_content": "\n‘हॅम्लेट’चे आता बेळगाव, पुण्यात प्रयोग\nमंगळवार, 9 मे 2017\nकोल्हापूर - महान नाटककार विल्यम्‌ शेक्‍सपिअर यांची जगप्रसिद्ध शोकांतिका ‘हॅम्लेट’ येथील स्थानिक रंगकर्मींनी व्यावसायिक रंगभूमीवर आणली आहे. काल (रविवारी) कोल्हापूरकरांच्या हाऊसफुल्ल गर्दीत या नाटकाचा पहिला प्रयोग सफाईदार रंगला.\nकोल्हापूर - महान नाटककार विल्यम्‌ शेक्‍सपिअर यांची जगप्रसिद्ध शोकांतिका ‘हॅम्लेट’ येथील स्थानिक रंगकर्मींनी व्यावसायिक रंगभूमीवर आणली आहे. काल (रविवारी) कोल्हापूरकरांच्या हाऊसफुल्ल गर्दीत या नाटकाचा पहिला प्रयोग सफाईदार रंगला.\nदरम्यान, लेखक परशुराम देशपांडे, शेक्‍सपिअरच्या साहित्याचे अभ्यासक डॉ. आनंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिला प्रयोग सादर झाला. नाटकाचे प्रयोग आता बेळगाव आणि पुण्यात होणार असून त्यानंतर राज्यभरात दौरे होणार आहेत. जगभरातील अनेक संस्थांनी आजवर हे नाटक रंगमंचावर आणले. या नाटकावर चित्रपटही निघाले. सिग्मन्ड फ्रॉईड यांच्यासारख्या मानसशास्त्रज्ञांनी या नाटकाचा अभ्यास केला. ‘हॅम्लेट’च्या या विशेषतेमुळे अनेक दिग्दर्शक हे नाटक वेगवेगळ्या पद्धतीने हाताळतात. अशा या काहीशा गूढ नाटकाच्या दिग्दर्शनाचे शिवधनुष्य ‘याकूब’ व ‘अँतिगॉन’ च्या यशानंतर किरणसिंह चव्हाण यांनी पेलले.\nयेथील एम. बी. थिएटरची निर्मिती व परिवर्तन कला फौंडेशन सादरकर्ते आहेत. मंदार भणगे, दिलीप सामंत, प्रिया काळे, स्नेहल बुरसे, महेश भूतकर, सुहास भास्कर, एन डी चौगले, हर्षल सुर्वे, अभिजित कांबळे, संजय पटवर्धन, रोहित जोशी, केदार अथणीकर, हेमंत धनवडे, सागर पिलारे यांच्या भूमिका आहेत. राजेश शिंदे यांचे संगीत आहे. वेशभूषा महेश भूतकर व एन. डी. चौगले यांची आहे. स्नेहल बुरसे व किरणसिंह चव्हाण यांनी नेपथ्य केले आहे तर कला संयोजनाची जबाबदारी संजय पटवर्धन यांनी उचलली आहे.\nहॅम्लेटची कथा, शेक्‍सपिअरचे समृद्ध साहित्य महाराष्ट्रातील रसिकांपर्यंत पोहोचावे, हाच या नाटकाच्या निर्मितीचा उद्देश आहे\n- किरणसिंह चव्हाण, दिग्दर्शक\nमराठा इन्फट्रीतून प्रशिक्षणार्थी जवान बेपत्ता\nबेळगाव: मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरमधून ( एमएलआय आरसी) प्रशिक्षनार्थी जवान बेपत्ता झाला आहे. या संबंधी शुक्रवारी (ता. 17) कॅम्प पोलीस...\nभाषणात मोठी ताकद आहे.. : बबन साळगांवकर\nसावंतवाडी : भाषणात मोठी ताकद आहे त्याच वक्तृत्वाचा फायदा घेऊन तब्बल 23 दिवसांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे पहिल्यांदा आमदार बनले आणि त्यांनी नंतर...\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nसंग्रामपूर : वाण धरण ६५ टक्के भरले\nसंग्रामपूर : सातपुडा पर्वतामधील तीन जिल्ह्यांसाठी जलसंजीवनी ठरलेले वाण धरण 65 टक्के भरले आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या ...\nपंकज भूसे यांचा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव\nसरळगांव - महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी होऊन दिलेल्या उद्दिष्टा पेक्षा जास्त वृक्ष लागवड करून उत्कृष्ट कामगिरी केल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-nda-passing-out-parade-navy-chief-sunil-lanba-48750", "date_download": "2018-08-18T10:51:25Z", "digest": "sha1:WOAOSLQYKOGKZ55AANAI34FY5RWPXLDO", "length": 11990, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news NDA passing out parade navy chief sunil lanba आपल्यासाठी देश प्रथम हवा: नौदल प्रमुख लांबा | eSakal", "raw_content": "\nआपल्यासाठी देश प्रथम हवा: नौदल प्रमुख लांबा\nमंगळवार, 30 मे 2017\nखडतर प्रशिक्षण हेच आपल्याला कठिणातील कठिण आव्हानासाठी सज्ज करत असते, हे लक्षात ठेवा. शिस्त, धाडस, चिकाटी यांना पर्याय नाही. तुम्हाला पुढील आयुष्यभर याचा उपयोग होणार आहे.\nपुणे : आपल्यासाठी देश प्रथम असायला हवा, हे कधीही विसरू नका. लक्षात ठेवा. देशाची सेवा करताना कोणताही प्रयत्न लहान नाही आणि कोणतेही योगदान अत्युच्च नाही सेवा परमो धर्महा हा मंत्र कधीही विसरू नका आणि मानवतेसाठी सदैव सज्ज राहा, असे प्रेरणादायक भाषण भारतीय नौदल प्रमुख ऍडमिरल सुनील लांबा यांनी एनडीएतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसमोर केले.\nराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (एनडीए) पासिंग आऊट परेड आज (मंगळवार) सकाळी पार पडली. यावेळी पावसाच्या सरी कोसळल्या, तरीही नागरिकांनी ही परेड पाहण्यासाठी गर्दी केली होती.\nनौदल प्रमुख सुनील लांबा म्हणाले, की सर्व कॅडेट्सचे मनःपूर्वक अभिनंदन तुमच्या कठोर मेहनतीचे फळ आज तुम्हाला मिळत आहे. यात तेवढाच महत्त्वाचा वाटा तुमच्या आई वडिलांचा सुद्धा आहे. खडतर प्रशिक्षण हेच आपल्याला कठिणातील कठिण आव्हानासाठी सज्ज करत असते, हे लक्षात ठेवा. शिस्त, धाडस, चिकाटी यांना पर्याय नाही. तुम्हाला पुढील आयुष्यभर याचा उपयोग होणार आहे. चूक काय आणि बरोबर काय, यातील फरक काय, हे ताडून पाहणे तुम्हाला नेहमी जमायला हवे. येत्या आव्हानाचा काळात सकारात्मक दृष्टिकोन हाच तुमचा खरा वाटाड्या असेल. आता तुम्ही प्रत्यक्ष फील्डवर काम सुरू कराल. अशावेळी तुमच्यात काही व्यावसायिक मूल्ये विकसित होणे आवश्यक ठरेल. पण एनडीएमध्ये मिळालेले प्रशिक्षण विसरू देऊ नका. देशाच्या लष्कराची मान उंचावायला सज्ज व्हा. तुम्हाला शुभेच्छा तुमच्या कठोर मेहनतीचे फळ आज तुम्हाला मिळत आहे. यात तेवढाच महत्त्वाचा वाटा तुमच्या आई वडिलांचा सुद्धा आहे. खडतर प्रशिक्षण हेच आपल्याला कठिणातील कठिण आव्हानासाठी सज्ज करत असते, हे लक्षात ठेवा. शिस्त, धाडस, चिकाटी यांना पर्याय नाही. तुम्हाला पुढील आयुष्यभर याचा उपयोग होणार आहे. चूक काय आणि बरोबर काय, यातील फरक काय, हे ताडून पाहणे तुम्हाला नेहमी जमायला हवे. येत्या आव्हानाचा काळात सकारात्मक दृष्टिकोन हाच तुमचा खरा वाटाड्या असेल. आता तुम्ही प्रत्यक्ष फील्डवर काम सुरू कराल. अशावेळी तुमच्यात काही व्यावसायिक मूल्ये विकसित होणे आवश्यक ठरेल. पण एनडीएमध्ये मिळालेले प्रशिक्षण विसरू देऊ नका. देशाच्या लष्कराची मान उंचावायला सज्ज व्हा. तुम्हाला शुभेच्छा\nMaratha Kranti Morcha : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री आंदोलन\nपुणे : मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे सोमवारपासून (ता.20) मराठा आरक्षणासाठी आणि विविध मागण्यांसाठी पुणे विभागीय आयुक्त...\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून सहाजण जखमी\nबेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने बंगळूरकडे जाणारी व्हीआरएलची आराम बस उलटून चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय...\nघरकामगार, बांधकाम मजूर महिलांची उपेक्षाच\nजळगाव : दिवसरात्र काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, पण डोक्‍यावर हक्काचं छत नाही...सतत कष्ट करूनही पदरी काहीच न पडल्यामुळे अनेकदा उपवास...\n13 वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू\nवारजे (पुणे) : महापालिकेच्या पथदिव्याच्या विजेच्या खांबाला धक्का लागून वारजे परिसरातील तेरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/506150", "date_download": "2018-08-18T10:28:04Z", "digest": "sha1:WBHIRWFMCEABK3FNATQ6J3L5H625WI7H", "length": 7310, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कवठेएकंदमध्ये शालेय विद्यार्थ्याची गळफासाने आत्महत्त्या - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » कवठेएकंदमध्ये शालेय विद्यार्थ्याची गळफासाने आत्महत्त्या\nकवठेएकंदमध्ये शालेय विद्यार्थ्याची गळफासाने आत्महत्त्या\nतासगाव : परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.\nतासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यांने त्याच्याशी जबरदस्तीने झालेल्या अनैसर्गिक कृत्याचे मनास वाईट घेऊन गळफास लावून घेवून आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. तर याप्रकरणी त्या विद्यार्थ्यांचा मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कवठेएकंद येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजन माने यांनी दिली. तर संबंधीत व्यक्तीस ताब्यात घेण्यासाठी गुरुवारी कवठेएकंद येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. यामुळे कवठेएकंद येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.\nतासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील कपील विनायक गुरव वय 16 वर्षे 11 महिने असे आत्महत्या केलेल्या शालेय विद्यार्थ्यांचे नाव आहे. तर याप्रकरणी त्याचे वडील विनायक तानाजी गुरव रा. कवठेएकंद ता. तासगाव यांनी विलास यशवंत गुरव वय अंदाजे 66 रा. कवठेएकंद ता. तासगाव यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.\nयामध्ये म्हटले आहे, विलास गुरव हे गावातील मारुती मंदिराचे पाठीमागे राहण्यास असून त्याचे घरी आमचे जाणे येणे होते. तर कपील हा त्याचे घरी अधूनमधून जात होता. 26 जून रोजी रात्री 9 वाजता कपील यास माझे घरी चल असे म्हणून विलास काका कपील यास घरी घेऊन गेले. दुसऱया दिवशी कपील घरी आला. तर दुसरे दिवशी तो घरी झोपताना तु विलास काकाचे घरी जात नाहीस काय विचारले असता त्याने माझी तब्येत बिघडली आहे असे सांगितले.\n28 जून रोजी कपील याने पोटात दुखत आहे, मला खूप त्रास होत आहे असे सांगितले तेव्हा मी त्याला दोन दिवस झाले तु मला का सांगितले नाही असे विचारले असता त्याने सांगितले, विलास याच्या घरी 26 जून रोजी मी झोपणेस गेलो. नंतर रात्रीचे वेळी ते माझ्याशी जवळीक करायला लागले तेव्हा मी ओरडलो असता त्यांनी माझे तोंड दाबून धरले व माझे इच्छेविरुद्ध जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य केले.\nजिल्हय़ातील हजारो विद्यार्थी मोफत पुस्तकापासून वंचित\nचैत्री यात्रेसाठी दोन लाख भाविक\nमहापालिका आयुक्त मस्तवाल, अहंकारी\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%A3_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%95", "date_download": "2018-08-18T09:56:48Z", "digest": "sha1:C4BIETD2MQGFQV7BJIAP2YWZMI5MELFN", "length": 4125, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कण त्वरक - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकण त्वरक व प्रयोगशाळा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ एप्रिल २०१४ रोजी २१:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95/", "date_download": "2018-08-18T10:57:21Z", "digest": "sha1:A2Z2UGG5RQLSCB4FSCGKSLOLEIVTEYU4", "length": 15692, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "युजीसी बंद करण्याची प्रकाश जावडेकर यांची घोषणा - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे…\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची…\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Desh युजीसी बंद करण्याची प्रकाश जावडेकर यांची घोषणा\nयुजीसी बंद करण्याची प्रकाश जावडेकर यांची घोषणा\nनवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – केंद्र सरकारने विद्यापीठ अनुदान आयोग (युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी उच्च शिक्षण आयोग ( हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया (एचईसीआय) ची स्थापना करण्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.\nनव्या आयोगाच्या माध्यमातून केवळ संशोधन आणि शिक्षणाच्या गुणवत्तेवर लक्ष देण्यात येणार आहे. विद्यापीठ किंवा महाविद्यालयांना अनुदान देण्याचे काम मंत्रालय करेल. या आयोगाला बोगस संस्था आणि त्यांच्याशी संबंधित लोकांवर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.\nत्यासाठी १९५१ चा यूजीसी अॅक्ट संपुष्टात आणत, नवा एचईसीआय अॅक्ट २०१८ लागू करण्यात येणार आहे. प्रकाश जावडेकर यांनी याबाबतचा ड्राफ्ट जारी करून सूचना आणि हरकती मागवल्या आहेत.\nयूजीसी केवळ अनुदान देण्यातच व्यस्त होती. शिक्षण संस्थांची गुणवत्ता, संशोधन किंवा मार्गदर्शन याकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र, आता नवा आयोग केवळ शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनावरच लक्ष केंद्रीत करणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.\nPrevious articleपुण्यातील अमित शहांच्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांना प्रवेश नाही\nNext articleआणीबाणी म्हणजे भारतीय लोकशाहीला बसलेला कलंक – डॉ. प्रतिभा लोखंडे\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nवाजपेयींच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनाला दिग्गजांची रीघ; फडणवीस यांच्याकडून पार्थिवाचे अत्यंदर्शन\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nधक्कादायक : किरकोळ कारणावरुन पतीने पत्नीचे नाक करकचून चावून केले जखमी\nमुळशीत फायटर कोंबड्यांच्या झुंजीवर पैसे लावून जुगार खेळणारे १६ जण गजाआड\nपक्षाचे नेतृत्व करण्यावरून करूणानिधींच्या दोन्ही मुलांमध्ये धुसफूस\nआरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने आज राज्यभर आंदोलन\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा; राज्यसभेत विधेयकाला मंजुरी\nधक्कादायक: दिल्लीतील कोर्टाच्या चेंबरमध्ये वरिष्ठ वकिलाने केला महिला विकालावर बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-18T10:57:17Z", "digest": "sha1:QZ47JRFS76JNIHUVEVKP3HQ3HVX3JJEZ", "length": 16074, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "सोनाली बेंद्रे कॅन्सरग्रस्त; न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे…\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची…\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Maharashtra सोनाली बेंद्रे कॅन्सरग्रस्त; न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू\nसोनाली बेंद्रे कॅन्सरग्रस्त; न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू\nमुंबई, दि. ४ (पीसीबी) – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर झाला आहे. ट्विटरच्या माध्यमातून तिने स्वत: ही धक्कादायक माहिती दिली आहे. सोनालीवर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू आहेत. ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ या रिअॅलिटी शोमध्ये ती परीक्षक होती. मात्र वैयक्तिक कारण सांगत सोनालीने हा शो अर्ध्यावरच सोडला होता. ‘सरफरोश’, ‘हम साथ साथ है’ आणि ‘लज्जा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने दमदार भूमिका साकारली आहे.\nट्विटरवरील भावनिक पोस्टमध्ये तिने लिहिलं की, ‘अनपेक्षितपणे तुमच्या आयुष्यात एक वळण येतं. मला हाय- ग्रेड कॅन्सर असल्याचं निदान झालं आहे. सतत वेदना जाणवत असल्याने काही चाचण्या केल्या आणि त्यातून कॅन्सर झाल्याचं अनपेक्षितपणे निदान झालं. माझे कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींनी खूप साथ दिली आहे. त्या सर्वांचे मी आभार मानते.’\n‘डॉक्टरांच्या सांगण्यानुसार मी त्यावर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. या मार्गातील प्रत्येक अडचणीला सामोरं जाण्यास मी सज्ज आहे. यात गेल्या काही दिवसांपासून लोकांकडून मला मिळत असलेल्या प्रेमाची फार मदत होत आहे. कुटुंबीय आणि मित्र-परिवार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने मी ही लढाई लढण्यास सज्ज आहे.’\nPrevious articleगंधर्व हॉलमध्ये वारकऱ्यांसाठी मोफत औषधे व आरोग्य सेवा पुरविण्याचा उपक्रम रावबिला\nNext articleपुण्यात विद्यार्थिनींच्या अंतर्वस्त्रांबाबत शाळेच्या जाचक अटी; पालकांचा शिक्षण सहसंचालकांना घेराव\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घाेषणा\nहिम्मत होती तर एकेकाने यायचे होते मग दाखवले असते; औरंगाबादेतील एमआयएम नगरसेवकाचा माज\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nकॉसमॉस बँकेची आर्थिक स्थिती उत्तम- अध्यक्ष\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १२७ वी जयंती\nनरेंद्र मोदींची तुलना हिटलरशी करणे अयोग्य – मिलिंद देवरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8.html", "date_download": "2018-08-18T11:02:30Z", "digest": "sha1:JWDPABHCKILFVYNTQ5IEILI4GYTCODIU", "length": 21189, "nlines": 292, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | हवाला मार्गे आला ‘आप’चा निधी", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » हवाला मार्गे आला ‘आप’चा निधी\nहवाला मार्गे आला ‘आप’चा निधी\n=अरुण जेटली यांचा आरोप=\nनवी दिल्ली, [३ फेब्रुवारी] – दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला चार दिवसच उरले असताना, आम आदमी पार्टीला मिळणार्‍या निधीवरून राजकीय वर्तुळात मोठे वादळ उठले आहे. आम आदमी पार्टी देणग्यांच्या माध्यमातून आपला काळा पैसा पांढरा करीत असल्याचा आरोप आवाम या स्वयंसेवी संस्थेने केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या पक्षावर थेट हल्ला करताना, ‘आप’चा निधी हवालामार्गे आला असल्याची तोफ डागली आहे.\nअरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पक्षाला मिळणार्‍या निधीचा स्रोत जाहीर करावा, अशी मागणी जेटली यांनी केली आहे. तर, आवामने आज मंगळवारी पुन्हा एकदा आपवर ताशेरे ओढत, हा पक्ष आपला काळा पैसा देणग्यांच्या नावावर पांढरा करीत असल्याचा आरोप केला.\nआवाम या संस्थेने मंगळवारी आयोजित एका पत्रपरिषदेत आपला देणगीरूपात मिळालेले धनादेशही दाखविले. केजरीवाल आणि त्यांच्या पक्षातील नेते मोठमोठ्या कंपन्यांना रोख रक्कम देत आहेत आणि त्यांच्याकडून मोठ्या रकमेचे धनादेश स्वीकारत आहेत, असा आरोप आवामने केला आहे.\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nपेट्रोल, डिझेल पुन्हा स्वस्त\n=कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीचा फायदा= नवी दिल्ली, [३ फेब्रुवारी] - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने त्याचा फायदा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%82-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2018-08-18T09:55:29Z", "digest": "sha1:LVVOQID4MXJKNRDSP55BIUFSWCBFA4BN", "length": 5646, "nlines": 112, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "सेतू विभाग | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क् अधिनियम 2015 (सेतु विभाग)\nवय, राष्ट्रीयत्त्व आणि अधिवास प्रमाणपत्र देणे.\nनॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्र देणे.\nतात्पुरता रहिवासी दाखला देणे.\nजेष्ठ नागरीक प्रमाणपत्र देणे.\nसंस्कृतीक कार्यक्रम परवाना देणे.\nअधिकार अभिलेखाची प्रमाणीत प्रत देणे.\nअल्प भुधारक दाखला देणे.\nभूमीहीन शेतमजुर असल्याचा दाखला देणे.\nशेतकरी असल्याचा दाखला देणे.\nडोंगर/दुर्गम क्षेत्रात राहात असल्याचे प्रमाणपत्र देणे.\nउदयोजकांना म.ज.म सहित १९६६ च्या कलम 44 अ तरतुदीनुसार परस्पर ओद्योगिक वापर सुरु करणे शक्य होण्याकरिता आवश्यक अधिकृत माहिती उपलब्ध करून देणे.\nओद्योगिक प्रयोजनार्थ जमीन खोदण्याची परवानगी देणे.\nओद्योगिक प्रयोजनार्थ जमीन वापरण्याकामी अधिसुचित वृक्ष तोड परवानगी देणे.\nप्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र देणे.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/535260", "date_download": "2018-08-18T10:28:22Z", "digest": "sha1:EIWDQK2NNHYNVOAUKRTH2CQLO7PBUIQH", "length": 11200, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नववर्षारंभी घरोघरी पाईपद्वारे गॅस पुरवठा! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » नववर्षारंभी घरोघरी पाईपद्वारे गॅस पुरवठा\nनववर्षारंभी घरोघरी पाईपद्वारे गॅस पुरवठा\nपहिल्या दिवशी 50 जणांना जोडण्या,\nइंधन खर्चात किमान 20 टक्के बचत\nरत्नागिरी शहरात नववर्षाच्या प्रारंभापासून पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्याच्या योजनेला सुरुवात होत आहे. 1 जानेवारी रोजी या योजनेचे उद्घाटन करताना 50 घरांमध्ये गॅस जोडणी देण्यात येणार आहे. पाईपलाईनद्वारे पुरविण्यात येणारा हा गॅस घरगुती सिलींडरपेक्षा सुमारे 20 टक्के स्वस्त असून त्याचा पुरवठा अखंडीत होणार असल्याने ही योजना लोकप्रिय होईल, असा विश्वास युनीसन एनव्हायरो प्रायव्हेट लिमिटेडचे प्रमुख अधिकारी विनोद पापळ यांनी व्यक्त केला.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरांमध्ये सिलेंडरमुक्त गॅस आणि ग्रामीण भागात लाकुडमुक्त इंधन असे धोरण स्वीकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हय़ात शहरी भागात पाईपद्वारे गॅस पुरवठा तर ग्रामीण भागात प्रत्येक घरी गॅस सिलेंडर देण्याचे धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सहकार्याने 1 जानेवारी 2018 पासून ही योजना कार्यान्वीत होणार असल्याची माहिती पापळ यांनी दिली.\nरत्नागिरी शहर परिसराबरोबर चिपळूण, देवरूख, सावर्डे, संगमेश्वर, गणपतीपुळे, गुहागर याठिकाणी पहिल्या टप्प्यात घरगुती वापराचा गॅस पाईपद्वारे पुरवण्याची योजना आह़े त्यासाठी ऑक्टोबर 2017 मध्ये जमिनीखालील वायु वाहिनी घालण्याचे काम सुरू झाले आहे. हे काम मार्च 2018 मध्ये पूर्ण होईल़ त्यानंतर मागणीप्रमाणे ग्राहकांना जोडणी देण्यात येईल.\nपाईपद्वारे वायु पुरवठा हा पर्यावरण पूरक असून तो सतत उपलब्ध असत़ो सिलेंडर संपण्याची कटकट नाह़ी तो वापरकर्त्याला मैत्रीपूर्ण उपयोगाची जाणीव देत असतो. रत्नागिरी जिह्यातील लोटे-पर्शुराम, रत्नागिरी व देवरूख येथील औद्योगिक वसाहतींमध्ये मागणीप्रमाणे जोडणी देण्यात येईल़\nरत्नागिरी परिसरात 10 हजार, चिपळुणात 8 हजार, देवरूखात 600, खेड-लोटे 100, सावर्डेत 600, गणपतीपुळेत 400 एवढय़ा घरगुती वापराच्या वायुजोडण्या देण्याचे उद्दिष्ट आह़े या करिता 500 ऱू फॉर्म फी, 1000 रू. नोंदणी व जोडणी, 5000 हजार ऱू अनामत (परतावा पात्र) शुल्क ठेवण्यात येणार आह़े सध्याच्या सिलेंडरद्वारे मिळणाऱया गॅसपेक्षा हा गॅस 20 टक्के एवढा स्वस्त राहणार आह़े, असे त्यांनी सांगितल़े रत्नागिरी शहरासोबत कुवारबाव, शिरगाव, कारवांचीवाडीपर्यंत त्याचा विस्तार करण्यात येणार आह़े. रत्नागिरी जिह्यात 20 हजार जोडण्या देण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले असल्याचे पापळ यांनी सांगितले.\nदुसऱया टप्प्यात दापोली, मंडणगड, राजापूर, लांजा या शहरांमध्ये पाईपद्वारे वायू जोडणी देण्याकरिता 2018 मध्ये काम करण्यात येणार आहे. यामुळे जिह्यातील सर्व शहरात पाईपद्वारे गॅस मिळेल़ यामुळे ग्रामीण भागात सिलेंडर जोडणीचा विस्तार वाढवणे सरकारला शक्य होईल़\nडिसेंबर 2017 पर्यंत गाडय़ांसाठी सीएनजी उपलब्ध करून देण्यात येईल़ त्यासाठी रत्नागिरी शहर, जेके फाईल्स परिसर, रेल्वे स्टेशन परिसर येथे वितरण केंद्र ठेवण्यात येणार आह़े चिपळूणात 2 तर देवरूख, सावर्डे, गणपतीपुळे, गुहागर, लोटे या ठिकाणी गाडय़ांसाठी प्रत्येकी 1 सेएनजी केंद्र सुरू करण्यात येणार आहे रत्नागिरी जिह्यात 15 हजार ऑटो रिक्षा पेट्रोलवर सुरू आहेत़\nरत्नागिरीतील पाईपलाईनचे काम सुरु करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेकडे अधिकृत प्रस्ताव दाखल झाला आहे. पाण्याच्या पाईपलाईनप्रमाणे गॅस वाहिनीसाठी सरकारी दराने होणारे शुल्क भरण्यास आम्ही तयार आहोत. हे काम जनहिताचे असून ते लवकरात लवकर व्हावे म्हणून आपला पूर्ण पाठिंबा राहिल, अशी ग्वाही आमदार उदय सामंत आणि नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी आपल्याला दिल्याचे पापळ यांनी सांगितले.\nचिपळुणच्या माय-लेकीचा महाडात अपघाती मृत्यू\nलाडक्या ‘गौराई’चे आज आगमन\nऐन गणेशोत्सवात ‘प्रभूं’वर अवकृपा\nआर्थिक तरतुदीनंतरही कोकणातील रेल्वे प्रकल्प ‘वेटींग’वर\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A3/", "date_download": "2018-08-18T10:58:12Z", "digest": "sha1:KTMIDM5IRH5UCP7WK2CPVIHC5EICRT56", "length": 15078, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "सांगवी परिसरात चार ठिकाणी वटपौर्णिमेदिवशीच महिलांच्या गळ्यातील सोने चोरट्यांनी पळवले - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे…\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची…\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Chinchwad सांगवी परिसरात चार ठिकाणी वटपौर्णिमेदिवशीच महिलांच्या गळ्यातील सोने चोरट्यांनी पळवले\nसांगवी परिसरात चार ठिकाणी वटपौर्णिमेदिवशीच महिलांच्या गळ्यातील सोने चोरट्यांनी पळवले\nचिंचवड, दि. २७ (पीसीबी) – सांगवी परिसरात तब्बल चार ठिकाणी वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा करण्यासाठी निघालेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी हिसकावून चोरु नेल्याने खळबळ उडाली आहे. या चारही घटना आज (बुधवार) सकाळच्या सुमारास कल्पतरू सोसायटी परिसर आणि पिंपळे सौदागर मधील मिलेनियम सोसायटीजवळ घडल्या.\nया घटनेमुळे सांगवी परिसरातील महिलांमध्ये भितीचे वातावरण आहे. तसेच आज वटपौर्णि असल्याने वडाची पूजा करण्यासाठी घराबाहेर जायचे कि नाही हा प्रश्न सांगवीतील महिलांना पडला आहे. त्यामुळे महिलांनी दागिने घालून बाहेर पडताना आपल्या दागिन्यांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच सांगवी पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन विविध ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.\nPrevious articleभारतात गरिबीच्या प्रमाणात झपाट्याने घसरण\nNext articleजन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी; पिंपळेगुरव येथे पुरूषांची अनोखी वटपौर्णिमा\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे पोस्टर\nपिंपळेगुरवमध्ये रविवारी पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त स्नेहमेळाव्याचे आयोजन\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nकाही जण बोलघेवडे असतात, त्यांना नुसत्या सभा जिंकायच्या असतात ; अजित...\nमहाआघाडीला घाबरू नका, त्यांच्यावर कशी मात करायची हे माझ्यावर सोडा –...\nआरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने आज राज्यभर आंदोलन\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nनवी सांगवीत प्रियकराच्या साथीने मुलीची आईला मारहाण; प्रियकरासह मुलीला अटक\nथेरगावातील डांगे चौकात बाल वारकऱ्यांकडून दिंडीद्वारे समाजजागृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/sony-cybershot-dsc-rx1-price-psaN5.html", "date_download": "2018-08-18T10:17:24Z", "digest": "sha1:EAJSRQQABX5XB4AWYWGAYCW4W3BOHIZO", "length": 17954, "nlines": 429, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी सायबेरशॉट दशकं र्क्स१ सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी सायबेरशॉट दशकं र्क्स१\nसोनी सायबेरशॉट दशकं र्क्स१\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी सायबेरशॉट दशकं र्क्स१\nसोनी सायबेरशॉट दशकं र्क्स१ किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सोनी सायबेरशॉट दशकं र्क्स१ किंमत ## आहे.\nसोनी सायबेरशॉट दशकं र्क्स१ नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nसोनी सायबेरशॉट दशकं र्क्स१ऍमेझॉन उपलब्ध आहे.\nसोनी सायबेरशॉट दशकं र्क्स१ सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 2,26,843)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी सायबेरशॉट दशकं र्क्स१ दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी सायबेरशॉट दशकं र्क्स१ नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी सायबेरशॉट दशकं र्क्स१ - वापरकर्तापुनरावलोकने\nउत्कृष्ट , 2 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी सायबेरशॉट दशकं र्क्स१ - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसोनी सायबेरशॉट दशकं र्क्स१ वैशिष्ट्य\nकाँटिनूपूस शॉट्स Up to 5 fps\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 24.3 MP\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/4000 Seconds\nमिनिमम शटर स्पीड 30 seconds\nरेड इये रेडुकशन Yes\nडिस्प्ले तुपे TFT LCD\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 1228800 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1920 x 1080 pixels (Full HD)\nईमागे फॉरमॅट JPEG (RAW)\nविडिओ फॉरमॅट AVCHD, H.264\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nसोनी सायबेरशॉट दशकं र्क्स१\n5/5 (2 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2018-08-18T10:52:35Z", "digest": "sha1:EVPRF3HRZ4XE5IUBMAS5BB4PE5TUQFVD", "length": 8701, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चीन आणि भारताची तुलना करणे अयोग्य | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचीन आणि भारताची तुलना करणे अयोग्य\nरघुराम राजन यांचे मत\nन्युयॉर्क – भारत आणि चीन यांच्या आर्थिक स्थितीची चिंता करणे अयोग्य आहे. कम्युनिस्ट चीन हा भारतापेक्षा पाच पट अधिक मोठा आहे त्यामुळे ही तुलना अयोग्य ठरते असे प्रतिपादन भारताच्या रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले आहे. ही तुलना भारतावर अन्याय करणारी आहे. हे दोन्ही देश पुर्णत: वेगळे असून त्यांच्यात आर्थिक विकासाच्या बाबतीत अशी तुलना करता येऊ शकत नाही असे ते म्हणाले.\nहॉर्वर्ड केनडी स्कुल मध्ये दिलेल्या व्याख्यानात त्यांनी हे प्रतिपादन केले. ते म्हणाले की निकषांच्या आधारे तुलना केली तर भारताची ग्रोथ स्टोरी ही चीन पेक्षा अधिक आकर्षक आहे. भारताने गेली पंचवीस वर्षे सरासरीच्या सात टक्के दराने जीडीपी विकास केला. भारताच्या तुलनेत चीने पायाभूत सुविधा उभारणीत आणि मॅन्युफॅक्‍चरिंग सेक्‍टर मध्ये मोठे काम केले आहे तितके काम उभारणे भारताला शक्‍य झाले नाही. भारतात पायाभूत सुविधा उभारणे ही जिकीरीची बाब आहे असे नमूद करून ते म्हणाले की एखाद्या मार्गावर सहा पदरी महामार्ग उभारायचा तर भारतात हा मार्ग अनेकांच्या खासगी जमीनवरून जात असल्याने तेथे ही उभारणी करणे सहज शक्‍य नसते.\nचीन मध्ये ही समस्या नसल्याचे त्यांनी अप्रत्यक्षरित्या सुचीत केले. चीन मध्ये, कम्युनिस्ट पद्धतीची राजवट आहे. तेथे लोकभावना किंवा लोकांचा विरोध ही दुय्यम बाब असते. असेच बहुधा त्यांना सुचवायचे आहे. भारतीय लोकशाही हा भारतातील लोकांची सर्वात मोठी मिळकत आहे असेही राजन यांनी यावेळी नमूद केले. भारत लोकशाही मार्गाने विकास साधत असून येत्या दहा वर्षात भारत या बाबतीत चांगली प्रगती दाखवू शकेल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनऊ जागा महिलांसाठी राखीव\nNext articleभोसे येथे भैरवनाथ महाराज उत्सवात तरुणाई चिंब\nसंयुक्त राष्ट्र संघाचे माजी सचीव कोफी अन्नान यांचे निधन\nपाक व्याप्त कश्मीरच्या राष्ट्रपतींच्या शेजारी बसले सिध्दू, होतोय मोठा वाद\n“प्रत्येकाच्या मनात सद्भावना असल्यास देशात सहिष्णुता नांदेल’\nइस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांची पुन्हा चौकशी\nनिम्म्या कर्नाटकवर दुष्काळाचे सावट; मात्र काही भागांत पूरस्थिती\nकाश्‍मीरमधील ग्रेनेड हल्ल्यात एकाचा मृत्यूू, तिघे जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://shatadapremkarave.blogspot.com/2013/03/blog-post.html", "date_download": "2018-08-18T10:49:27Z", "digest": "sha1:VLPGOW2SJIQ4SGXRKEMEKDP23XIUEBLU", "length": 2706, "nlines": 53, "source_domain": "shatadapremkarave.blogspot.com", "title": "शतदा प्रेम करावे: रात्रीचा बंदोबस्त करावा म्हणतो...", "raw_content": "\nनमस्कार मित्रानो. मी अनिल बिहाणी . मझ्याबाबातीत सांगण्यासारखे विशेष काहिच नाहि.मी एक् सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य मुलगा आहे.पण प्रत्येक समान्यात कुठे तरि असामन्यत्व द्डलेलं असतं.माझ्यातल्या या असामान्यत्वाचा शोध् घेणे सद्या सुरु आहे.\nरात्रीचा बंदोबस्त करावा म्हणतो...\nहल्ली मी संध्याकाळी झोपतो\nकंटाळा येते हो रोज\nतीच जुनी आठवणींची पुस्तकं चाळायला\nबरं चाळली असती रोज हवं तर पण;\nनंतर तासनतास शुन्यात नजर लावून बसणं\nसोसत नाही हो हल्ली ...\nतेही केलं असतं पण कधीकधी\nयेणा-या पूरात वाहून जातं घर\nआणि टवके उडतात ,रंग उडतो\nपुन्हा जखमा उघड्या पडतात ..\nमग संध्याकाळची सुद्धा गरज पडत नाही\nम्हणून हल्ली मी संध्याकाळी झोपतो...\nआता रात्रीचा बंदोबस्त करावा म्हणतो...\nजय हो तेरी गोविंदा ......\nरात्रीचा बंदोबस्त करावा म्हणतो...\nही वाट दूर जाते .......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-08-18T10:57:32Z", "digest": "sha1:NVOGWQJFMDAN2BG6LVNV4IQGUFFJEC6N", "length": 18415, "nlines": 184, "source_domain": "pcbtoday.in", "title": "तुकोबांच्या पालखीचे उद्योगनगरीत आगमन; आकुर्डीत मुक्काम, शनिवारी पुण्याकडे प्रस्थान - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे…\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची…\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Banner News तुकोबांच्या पालखीचे उद्योगनगरीत आगमन; आकुर्डीत मुक्काम, शनिवारी पुण्याकडे प्रस्थान\nतुकोबांच्या पालखीचे उद्योगनगरीत आगमन; आकुर्डीत मुक्काम, शनिवारी पुण्याकडे प्रस्थान\nपिंपरी, दि. ६ (पीसीबी) – जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास उद्योगनगरीत आगमन झाले. आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात पालखी मुक्कामासाठी पोचली. शनिवारी (दि. ७) सकाळी पालखी पुण्याकडे प्रस्थान ठेवणार आहे. सर्व राजकीय पक्ष, विविध संस्था आणि संघटनांनी पालखीचे शहरात जोरदार स्वागत केले. त्याचप्रमाणे पालखीत सहभागी वारकऱ्यांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिका पदाधिकाऱ्यांच्या वतीने पालखीत सहभागी दिंडीप्रमुखांना ताडपत्रीचे वाटप करण्यात आले.\nआषाढी वारीसाठी विठ्ठलाच्या ओढीने संत तुकोबांच्या पालखीचे गुरूवारी (दि. ५) देहूगावातून प्रस्थान झाले. त्यानंतर तुकोबांच्या पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात झाला. शुक्रवारी (दि. ६) सकाळी पालखीने पुढील प्रवासासाठी प्रस्थान ठेवले. सायंकाळी पाचच्या सुमारास पिंपरी-चिंचवडचे प्रवेशद्वार असलेल्या निगडीतील भक्ती-शक्ती चौकाजवळ पालखीचे आगमन झाले. पालखीच्या स्वागतासाठी चौकात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेने भक्ती-शक्ती शिल्पसमूहालगत स्वागत कक्ष उभारला होता. महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक व अधिकाऱ्यांनी पालखीचे स्वागत केले.\nयंदा प्रथमच महापालिका नगरसेवकांच्या मानधनातून ताडपत्री खरेदी करून पालखीत सहभागी ३५० दिंडीप्रमुखांना भेट स्वरूपात देण्यात आले. यावेळी देहू संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख सुनील मोरे, विठ्ठल मोरे, अशोक मोरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पालखी आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामासाठी पोचली. यावेळी आकुर्डी ग्रामस्थ व पिंपरी-चिंचवडमधील भाविकांनी पालखीचे स्वागत केले. आकुर्डीतील मुक्कामानंतर शनिवारी (दि. ७) सकाळी पालखी पुण्याकडे प्रस्थान ठेवणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने वारकऱ्यांसाठी सर्व व्यवस्था आणि विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वारकऱ्यांना शाळा उपलब्ध करून देण्यासह विद्युत, आरोग्य, पाणीपुरवठाविषयक सुविधा देण्यात आल्या आहेत.\nतुकोबांच्या पालखीचे उद्योगनगरीत आगमन\nPrevious article…तर मी उध्दव ठाकरे यांचेही पाय धरेन – महादेव जानकर\nNext articleलवकरच येणार सनीचा बायोपिक\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा ऐवज जप्त\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nआदिवासी विभागात दोन लाख कोटींचा आरक्षण घोटाळा – उत्तम जानकर\nअटलबिहारी वाजपेयी यांचे निधन; देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर\nरूपयाची सत्तरी पार; अखेर मोदी सरकारने करून दाखवले – काँग्रेस\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपिंपरी-चिंचवडमधील सर्व स्थानिक मराठा नेते ओबीसी; गोरगरीब मराठा तरुणांना या नेत्यांच्या...\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचा महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न – नितीन काळजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://diamondbookspune.com/viewdetails.php?bid=875&cat=%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2018-08-18T09:58:31Z", "digest": "sha1:7QAHH7452FKWASV2LGD44NF7T5QEMNK6", "length": 5916, "nlines": 73, "source_domain": "diamondbookspune.com", "title": "Welcome to Diamond Publications", "raw_content": "\nशारीरिक शिक्षण व खेळ\nBook Name : राजकीय अर्थकारण 20 %\nAuthor : डॉ. प्रकाश पवार\n हा एक कूटप्रश्न आहे. प्राचीन काळी खासगी क्षेत्रांचा समावेश राजकीय म्हणून केला गेला, तर त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रांशी संबंधित घडामोडी म्हणजे राजकीय होय, असं मानलं गेलं. पुढे राजकीय अर्थकारण म्हणजेच राजकीय क्षेत्र ही धारणा आली. याच अनुषंगाने हे पुस्तक महाराष्ट्रातल्या दुसर्‍या सत्तांतरानंतरच्या निवडणुकीच्या राजकारणातली आणि राजकीय अर्थकारणातली तथ्यं मांडतं. आठ हजारांपेक्षा जास्त नेतृत्वसंख्येचं सामाजिक-विश्लेषण हे या पुस्तकाचं संख्याशास्त्रीय असं खास वैशिष्ट्य आहे. संघटित लोकशाही, व्यावसायिक प्रतिनिधित्व, नवहिंदुत्व या संकल्पनांचे नव्या संदर्भातले अर्थ या पुस्तकाद्वारे प्रथमच मांडले गेले आहेत. दोन्ही कॉंग्रेसची आणि शिवसेनेची झालेली पडझड, भाजपच्या वर्चस्वाची जडणघडण आणि भाजपकेंद्रित मूल्यव्यवस्थेमुळे घडून आलेल्या क्रांतीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण हा या पुस्तकाचा गाभा आहे. चालू राजकारणाचा आणि एकंदर राजकीय-आर्थिक परिस्थितीचा नवा अन्वयार्थ हे पुस्तक समोर आणत असल्यामुळे अभ्यासकांबरोबरच सर्वसामान्य वाचकांसाठीही ते निर्विवादपणे नवी दृष्टी देणारं ठरेल. \"\nसमाजशास्त्र ललित अर्थशास्त्र वाणिज्य-व्यवस्थापनशास्त्र\nइतिहास व्यक्तिमत्त्व विकास चरित्रे-आत्मचरित्रे पत्रकारिता-प्रसारमाध्यमे\nराज्यशास्त्र कविता संग्रह भूगोल धार्मिक\nमानसशास्त्र मराठी साहित्य पर्यावरण ग्रंथालय-माहितीशास्त्र\nस्पर्धा परीक्षा बाल-कुमार वाङमय आपत्ती व्यवस्थापन संगीत\nआरोग्य क्रमिक पुस्तके नाटकं आयुर्वेद\nअनुवादित पुस्तके बेस्टसेलर्स विज्ञानविषयक ज्योतिष\nकथा कोशवाङमय शिक्षणशास्त्र English Literature\nकादंबरी स्त्रीविषयक शारीरिक शिक्षण व खेळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/dhop-panchayat-plantation-41745", "date_download": "2018-08-18T11:01:34Z", "digest": "sha1:6DFF6ASE4QYDKMPUTAWJB6ARYNL5VFXU", "length": 15590, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "dhop panchayat plantation गावकऱ्यांच्या श्रमातून फुलली वनराई | eSakal", "raw_content": "\nगावकऱ्यांच्या श्रमातून फुलली वनराई\nसोमवार, 24 एप्रिल 2017\nधोपने ठेवला राज्यासमोर आदर्श : लाखोंचा महसूल मिळणार\nनागपूर - पंचायतराज अधिनियमनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करून हिवरेबाजारसारख्या गावाने राज्यासमोर वेगळा आदर्श निर्माण केला. गावकरी एकत्र आल्यास किती मोठा बदल घडू शकतो हे दाखवून दिले. यातूनच बोध घेत भंडारा जिल्ह्यातील धोप गावाने ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या सहकार्यातून तब्बल 14 एकरांवर वनराई तयार करून एक नवा आदर्श ठेवला.\nभंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्‍यातील धोप गावाचे नाव विदर्भात आदराने घेतले जाते. पंधराशे लोकवस्तीच्या या गावाने वेगळे असे काहीही न करता उपलब्ध संसाधनाचा वापर आणि शासकीय योजनाची जोड देऊन गावालगतच वनराई फुलविली.\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीना वृक्षलागवडीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे.\nधोप ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच जगदीश्‍वर शेंडे आणि विद्यमान सरपंच मंगला तिकलमंडे व ग्रामसेवक महेंद्र मेश्राम यांच्यासह ग्रामपंचायतच्या सदस्यांनी गावातील पडीक व अतिक्रमीत जागेवर वृक्षलागवड करण्याचा निर्धार तीन वर्षांपूर्वी केला.\nत्यानंतर त्या दिशेने पावले उचललीत. वृक्षलागवड करण्यासाठी गावातील जमिनीवरील अतिक्रमण काढून तब्बल 14 एकरांवर वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेतला. यासाठी मनरेगाच्या योजनेची मदत घेतली. 14 एकर जागेवर 12 हजारांवर वृक्षांची लागवड केली. यात आंबा, चिकू, पेरू, आवळा, फणस, लिंबू, काजू, हिरडा, बेहडा, सागवानच्या झाडांचा समावेश आहे.\nयातून तिसऱ्याच वर्षीपासून उत्पादन निघण्यास सुरुवात झाली. यंदा पेरू, आंब्याचे उत्पादन आले. मात्र, पहिल्या वर्षीचे उत्पादन गावकऱ्यांना वाटण्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला. पुढील वर्षीपासून या वनराईतून ग्रामपंचायतला 20 लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्‍यता आहे. या माध्यमातून प्राप्त होणारे उत्पन्न गावाच्या विकासावर खर्च केले जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्याने ग्रामपंचायतने पुन्हा 20 एकरांवर अशीच वनराई तयार करण्याचा संकल्प सोडला आहे.\n382 कुटुंबांना मिळाला रोजगार\nधोप गावाची लोकसंख्या 1,540 असून 382 कुटुंबे वास्तव्यास आहेत. या कुटुंबांना वनराईचे संगोपन करण्यासाठी विविध कामे देण्यात आली. मनरेगाअंतर्गत त्यांचे जॉब कार्ड तयार करून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. गावात हिरवळ निर्माण झाल्याने आणि हाताला काम मिळाल्याने गावकरीसुद्धा एकदिलाने यात सहभागी झाले. त्यामुळेच रोपवन केलेली सर्व 12 हजार झाडे जिवंत ठेवण्यास मदत झाली.\nपंचायतराज अधिनियमाने ग्रामसभेला बरेच अधिकार मिळाले आहेत. ग्रामपंचायतीने या अधिनियमाची गावकऱ्यांना जाणीव करून देत त्याचा योग्य वापर केल्यास गावाचा कसा कायापालट होऊ शकतो. याचा आदर्श या वनराईच्या रूपाने घालून दिला. यात गावातील प्रत्येक व्यक्‍ती, सरपंच, पदाधिकारी, अधिकारी कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे.\nधोप ग्रामपंचायतीचे कार्य केवळ वनराईपुरतेच मर्यादित नाही. त्यांनी जलसंधारण व मृदसंधारणाची विविध कामे केली. आता जलपुनर्रभरणासाठी घर तिथे शोषखड्डा तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यात लोकसहभागदेखील महत्त्वपूर्ण आहे.\nटाकवे बुद्रुक - सावित्रींच्या लेकींना दुस-या टप्प्यात पंधरा सायकलींचे वाटप\nटाकवे बुद्रुक - आंदर मावळाच्या मिंडेवाडी तील ठाकरवस्ती, चावसरवस्ती, जाधववाडीतून पायपीट करीत येणा-या विद्यार्थ्यांसह सावित्रींच्या लेकींना दुस-या...\nसंयुक्त राष्ट्रांच्या माजी महासचिवांचे निधन\nसंयुक्त राष्ट्रसंघ- संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण महासभेचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन झाले आहे. 8 एप्रिल 1938 रोजी त्यांचा घाना या देशात...\n'एक धागा शौर्य' का सैनिकांसाठी जुन्नरच्या विद्यार्थ्यांनीचा अभिनव उपक्रम\nजुन्नर - सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांसाठी जुन्नरच्या शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थिनींनी 'एक धागा शौर्य'का हा अभिनव...\nबारामती - विद्या प्रतिष्ठानच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पुरस्कार\nबारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट...\nपंकज भूसे यांचा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव\nसरळगांव - महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी होऊन दिलेल्या उद्दिष्टा पेक्षा जास्त वृक्ष लागवड करून उत्कृष्ट कामगिरी केल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/minority-student-248-division-permission-123564", "date_download": "2018-08-18T10:58:42Z", "digest": "sha1:XU3IYD5EZJLCBH4HYGSR7WFP4O6C2KKE", "length": 13984, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Minority student 248 division permission अल्पसंख्याकांसाठी २४८ तुकड्यांना मंजुरी | eSakal", "raw_content": "\nअल्पसंख्याकांसाठी २४८ तुकड्यांना मंजुरी\nगुरुवार, 14 जून 2018\nकऱ्हाड - अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राज्यातील सुमारे ४२ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दुसऱ्या व तिसऱ्या पाळीत २४८ तुकड्यांना मंजुरी दिली आहे. या तुकड्यांसह मुंबईच्या दोन नवीन प्रशिक्षण संस्थेत २८ तुकड्यांनाही शासनाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात १५ कोटींची तरतूद केली आहे. त्यासाठी सात कोटी सात लाख २० हजारांचे अनुदान दिले आहे. राज्याच्या कौशल्य व विकास कार्यक्रमांतर्गत ही तरतूद केली आहे.\nकऱ्हाड - अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राज्यातील सुमारे ४२ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दुसऱ्या व तिसऱ्या पाळीत २४८ तुकड्यांना मंजुरी दिली आहे. या तुकड्यांसह मुंबईच्या दोन नवीन प्रशिक्षण संस्थेत २८ तुकड्यांनाही शासनाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात १५ कोटींची तरतूद केली आहे. त्यासाठी सात कोटी सात लाख २० हजारांचे अनुदान दिले आहे. राज्याच्या कौशल्य व विकास कार्यक्रमांतर्गत ही तरतूद केली आहे.\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण घेता यावे, त्यांच्यातील उद्योजकता वाढीस लागावी, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून २४८ तुकड्यांना मंजुरी दिली आहे. त्या तुकड्यांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सात कोटी सात लाख वीस हजारांचा निधीही शासनाने मंजूर केला आहे. त्या निधीतून त्या तुकड्यांसाठी लागणारा मूलभूत सुविधा, प्रवास खर्च, कार्यालयीन खर्च, प्रसिद्धी, जाहिराती, लहान बांधकामे, व्यावसायिक सेवा, शिष्यवृत्ती व यंत्रसामग्रीचा खर्च करणे अपेक्षित आहे. त्या संस्थांतील वेतनासाठीही शासनाने याच खर्चात सहा कोटी ८८ लाख ७५ हजारांचा खर्च मंजूर केला आहे. यासाठी १४ कोटी ५० लाखांची तरतूद केली आहे. यापूर्वी सात कोटी ८७ लाख ५० हजारांचा निधी दिला आहे. हा मंजूर निधी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या नियंत्रक अधिकाऱ्यांमार्फत वितरित करण्याचे ठरवले जाणार आहे. प्रत्यक्षात निधी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांकडून वितरित करण्यात येणार आहे. त्याबाबतचा वेळच्या वेळीचा तपशील संबंधित विभागाला त्या-त्या संस्थांनी कळवणे बंधनकारक केले आहे.\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वर्षभराची तरतूद १५ कोटींची\nपहिल्या टप्प्यात सात कोटी ८७ लाख ५० हजारांचा निधी वितरित\nवेतनासाठी सहा कोटी ८८ लख ७५ हजारांचा निधी\nउर्वरित एक कोटी ८४ लाख ५० हजारांचा निधी अन्य खर्चासाठी मंजूर\nखर्चाचे तपशील व उपयोगिता प्रमाणपत्र देऊन अहवाल देण्याचे बंधन\nसंयुक्त राष्ट्रांच्या माजी महासचिवांचे निधन\nसंयुक्त राष्ट्रसंघ- संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण महासभेचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन झाले आहे. 8 एप्रिल 1938 रोजी त्यांचा घाना या देशात...\nMaratha Kranti Morcha : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री आंदोलन\nपुणे : मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे सोमवारपासून (ता.20) मराठा आरक्षणासाठी आणि विविध मागण्यांसाठी पुणे विभागीय आयुक्त...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nबारामती - विद्या प्रतिष्ठानच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पुरस्कार\nबारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/saptrang-artical-anant-bagaitkar-55245", "date_download": "2018-08-18T10:51:00Z", "digest": "sha1:TOEJQPWJMZQUU72IWLJO65HM6DWN2SBH", "length": 23797, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "saptrang artical anant bagaitkar नितीशकुमारांचे अपने रंग हजार .... | eSakal", "raw_content": "\nनितीशकुमारांचे अपने रंग हजार ....\nसोमवार, 26 जून 2017\nवैचारिकतेच्या मुद्द्यावरून भाजपपासून फारकत घेणाऱ्या नितीशकुमार यांना आता त्याच भाजपची भूल पडत चालली आहे. त्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘एनडीए’चे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देताना त्यांनी अन्य विरोधी पक्षांची साथ सोडून दिली आहे.\nवैचारिकतेच्या मुद्द्यावरून भाजपपासून फारकत घेणाऱ्या नितीशकुमार यांना आता त्याच भाजपची भूल पडत चालली आहे. त्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘एनडीए’चे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देताना त्यांनी अन्य विरोधी पक्षांची साथ सोडून दिली आहे.\nएखाद्या राजकीय घडामोडीतून अनेक नवी राजकीय समीकरणे जन्माला येतात. देशाच्या चौदाव्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. यानिमित्ताने राजकारणाचा खेळ रंगणे अपरिहार्यच आहे. तसे घडतही आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विरोधी पक्षांची साथ सोडली. एकमेकांचे वैरी असलेले राजकीय पक्ष समान व्यापीठावर आले. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो या म्हणीची प्रचिती अशा निमित्ताने येत असते. राजकारणाची गतिमानता आणि चैतन्यशीलतेचे हे लक्षण आहे.\nएखादा नवीन ‘घरोबा’ करायचा झाला की त्याचे इतके कौतुक व प्रशंसा सुरू होते की जणू सद्‌गुणांची खाणच अतिस्वच्छ प्रतिमेचे नेते नितीशकुमार यांचे असेच काहीसे झाले आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या भक्तीत सध्या ते लीन आहेत. पण ते कोविंद यांचे की त्यांच्या सर्वोच्च नेत्याचे भक्त झालेत हे तपासण्याचीही वेळ आली आहे. या तल्लीनतेत त्यांनी विरोधी पक्षांची साथ सोडून दिली. नितीशकुमार सध्या ‘जिवलगा राहिले दूर घर माझे, पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे’ हे गाणे गातात म्हणे अतिस्वच्छ प्रतिमेचे नेते नितीशकुमार यांचे असेच काहीसे झाले आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या भक्तीत सध्या ते लीन आहेत. पण ते कोविंद यांचे की त्यांच्या सर्वोच्च नेत्याचे भक्त झालेत हे तपासण्याचीही वेळ आली आहे. या तल्लीनतेत त्यांनी विरोधी पक्षांची साथ सोडून दिली. नितीशकुमार सध्या ‘जिवलगा राहिले दूर घर माझे, पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे’ हे गाणे गातात म्हणे कारण त्यांच्या डोक्‍यावर, पाठीवर लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कथित गैरव्यवहारांचे ओझे असह्य होत चालले आहे. त्यामुळे त्यांचा पिच्छा कसा सोडवता येईल या विवंचनेत सध्या ते आहेत. त्यासाठी ते नाना करामती करू लागले आहेत. ज्या भाजपची साथ त्यांनी फार मोठी वैचारिक भूमिका घेऊन सोडली होती, त्याचा त्यांना आता सोईस्कर विसर पडत आहे आणि त्याच भाजपची आता त्यांना भूल पडत चालली आहे. त्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत कोविंद यांना पाठिंबा देणे हे या नव्याने झालेल्या प्रेमरोगाचे एक लक्षण आहे.\nनोटाबंदीच्या स्वागतापासूनच ही लक्षणे दिसू लागली होती. आता ती लक्षणे ठळकपणे प्रत्यक्ष कृतीत येत आहेत. लालूप्रसाद यांच्या गैरव्यवहारांची प्रकरणे बाहेर काढणारे बिहारचे भाजपनेते सुशील मोदी यांनी त्यांना मिळालेली माहिती सत्तारूढ संयुक्त जनता दलाच्या लोकांकडूनच मिळाल्याचा दावा केला आहे. आता त्यांचा हा दावा खरा आहे की खोटा याची खातरजमा कशी होणार त्याचे उत्तर नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाकडेच असणार त्याचे उत्तर नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाकडेच असणार पण यावर ना नितीशकुमार ना त्यांचे शिलेदार, कुणीच बोलायला तयार नाहीत पण यावर ना नितीशकुमार ना त्यांचे शिलेदार, कुणीच बोलायला तयार नाहीत त्यामुळे लालूप्रसाद यांच्या पक्षाचे (राष्ट्रीय जनता दल) एक वरिष्ठ नेते रघुवंशप्रसादसिंह यांनी बरोबर वार केला. सुशील मोदी यांना नितीशकुमार यांच्या पक्षाकडूनच माहिती मिळाली असेल, तर नितीशकुमार यांनी ते एकतर मान्य करावे, अन्यथा सुशील मोदी खोटे बोलत आहेत असे सांगून त्यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करावी त्यामुळे लालूप्रसाद यांच्या पक्षाचे (राष्ट्रीय जनता दल) एक वरिष्ठ नेते रघुवंशप्रसादसिंह यांनी बरोबर वार केला. सुशील मोदी यांना नितीशकुमार यांच्या पक्षाकडूनच माहिती मिळाली असेल, तर नितीशकुमार यांनी ते एकतर मान्य करावे, अन्यथा सुशील मोदी खोटे बोलत आहेत असे सांगून त्यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करावी रघुवंशप्रसादसिंह हे बिहारमधील आदरणीय नेते आहेत. त्यांची प्रतिमा नितीशकुमार किंवा कदाचित त्यांच्यापेक्षाही स्वच्छ आहे. केंद्रात ग्रामीणविकास मंत्री असताना ते त्यांच्या घरून मंत्रालयात आणि परत घरी चक्क पायीपायी येत-जात रघुवंशप्रसादसिंह हे बिहारमधील आदरणीय नेते आहेत. त्यांची प्रतिमा नितीशकुमार किंवा कदाचित त्यांच्यापेक्षाही स्वच्छ आहे. केंद्रात ग्रामीणविकास मंत्री असताना ते त्यांच्या घरून मंत्रालयात आणि परत घरी चक्क पायीपायी येत-जात गणित या विषयात त्यांनी डॉक्‍टरेट केलेली आहे. परंतु बिनइस्त्रीच्या जाड्याभरड्या खादीच्या कपड्यात त्यांचे खरे स्वरूप लक्षात येत नाही. त्यामुळे रघुवंशप्रसादसिंह यांनी दिलेले आव्हान नितीशबाबू स्वीकारणार काय\nनितीशबाबूंना आता २०१९चे वेध लागले आहेत. ते त्यांनी बोलूनही दाखवले. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या वेळी सर्वांत आधी नितीशबाबूच राहुल व सोनिया गांधी यांच्याकडे पोचले होते. सर्व विरोधी पक्षांनी मिळून भाजपच्या विरोधात संयुक्त उमेदवार उभा करावा असे त्यांनी आग्रहपूर्वक मांडले होते. पण सरतेशेवटी झाले काय त्यांनी स्वतःच पलायन केले व भाजप उमेदवाराला पाठिंबा देऊन टाकला त्यांनी स्वतःच पलायन केले व भाजप उमेदवाराला पाठिंबा देऊन टाकला ‘इस रंग बदलती दुनिया में इन्सान की नियत ठीक नहीं....’ दुसरे काय ‘इस रंग बदलती दुनिया में इन्सान की नियत ठीक नहीं....’ दुसरे काय आता विरोधी पक्षांनी मीरा कुमार यांची उमेदवारी जाहीर केली. त्या जगजीवनराम यांच्या कन्या आणि मूळच्या बिहारच्या. तर त्यावर नितीशबाबूंनी मखलाशी केली की बिहारच्या ‘बेटी’ला हरण्यासाठी उभे केले गेले आता विरोधी पक्षांनी मीरा कुमार यांची उमेदवारी जाहीर केली. त्या जगजीवनराम यांच्या कन्या आणि मूळच्या बिहारच्या. तर त्यावर नितीशबाबूंनी मखलाशी केली की बिहारच्या ‘बेटी’ला हरण्यासाठी उभे केले गेले वर भविष्यवाणीही केली की २०१९च्या निवडणुकीची ही पराभूत सुरवात आहे. वैचारिकतेच्या मुद्यावर भाजपची साथ सोडणाऱ्या नितीशबाबूंचे भान इतके हरपले आहे की मीरा कुमार हरणार आहेत हे सर्वांना माहिती आहे, पण विशिष्ट वैचारिक भूमिका घेऊन ही प्रतीकात्मक लढाई लढत असल्याचे स्पष्ट करूनच विरोधी पक्षांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तेव्हा नितीशबाबूंनी मखलाशी बंद केलेली बरी. त्यांना ज्यांचा हात पकडायचा असेल त्यांनी तो पकडावा वर भविष्यवाणीही केली की २०१९च्या निवडणुकीची ही पराभूत सुरवात आहे. वैचारिकतेच्या मुद्यावर भाजपची साथ सोडणाऱ्या नितीशबाबूंचे भान इतके हरपले आहे की मीरा कुमार हरणार आहेत हे सर्वांना माहिती आहे, पण विशिष्ट वैचारिक भूमिका घेऊन ही प्रतीकात्मक लढाई लढत असल्याचे स्पष्ट करूनच विरोधी पक्षांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तेव्हा नितीशबाबूंनी मखलाशी बंद केलेली बरी. त्यांना ज्यांचा हात पकडायचा असेल त्यांनी तो पकडावा पण रंग बदलता बदलता त्यांची ‘कटी पतंग’ कधी होईल हे त्यांनाही कळणार नाही.\nलालूप्रसाद यांना टार्गेट करताना नितीशकुमार यांच्याबाबत कोणताही उणा शब्द काढला जाऊ नये, असे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी जाहीरपणे त्यांच्या पक्षनेत्यांना बजावले होते. त्याचे पालन होते आहे. याचा अर्थ काय ‘दोनों तरफ लगी है आग बराबर ‘दोनों तरफ लगी है आग बराबर\nआता जरा दुसरीकडे पाहू राष्ट्रपतिपद निवडणुकीसाठी १७ विरोधी पक्षांची बैठक झाली. तीत सोनिया गांधी यांच्या एका बाजूला मनमोहनसिंग, तर दुसऱ्या बाजूला शरद पवार बसलेले होते, तर पवारांच्या पुढे लालूप्रसाद होते. समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव आणि बहुजन समाज पक्षाचे सतीशचंद्र मिश्र शेजारी शेजारी बसलेले होते. बाहेरदेखील ते बरोबर पडले. चक्क हास्यविनोद करत राष्ट्रपतिपद निवडणुकीसाठी १७ विरोधी पक्षांची बैठक झाली. तीत सोनिया गांधी यांच्या एका बाजूला मनमोहनसिंग, तर दुसऱ्या बाजूला शरद पवार बसलेले होते, तर पवारांच्या पुढे लालूप्रसाद होते. समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव आणि बहुजन समाज पक्षाचे सतीशचंद्र मिश्र शेजारी शेजारी बसलेले होते. बाहेरदेखील ते बरोबर पडले. चक्क हास्यविनोद करत उत्तर प्रदेशाच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले हे दोन्ही पक्ष सध्या एकत्र आले आहेत. आणखी एक नवे समीकरण उत्तर प्रदेशाच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले हे दोन्ही पक्ष सध्या एकत्र आले आहेत. आणखी एक नवे समीकरण पश्‍चिम बंगालच्या राजकारणातलेही दोन कट्टर प्रतिस्पर्धी पक्ष - मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि सत्तारूढ तृणमूल काँग्रेस पक्ष हेदेखील या १७ पक्षांमध्ये बरोबरीने बसलेले होते. ‘जो बिछड गये वो साथ आये, जो साथ थे वो बिछड गये पश्‍चिम बंगालच्या राजकारणातलेही दोन कट्टर प्रतिस्पर्धी पक्ष - मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि सत्तारूढ तृणमूल काँग्रेस पक्ष हेदेखील या १७ पक्षांमध्ये बरोबरीने बसलेले होते. ‘जो बिछड गये वो साथ आये, जो साथ थे वो बिछड गये \nनितीशकुमार म्हणतात ते एका अर्थाने खरे आहे. २०१९ किंवा जेव्हा कधी पुढची लोकसभा निवडणूक होईल त्याची ही राष्ट्रपति निवडणूक रंगीत तालीम आहे. पण या कळपात नितीशकुमार यांना स्थान मिळेल काय हे अनिश्‍चित आहे. पण पश्‍चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशात भाजपला यशस्वी टक्कर देण्यासाठी आणि प्रसंगी एकास एक उमेदवार उभे करण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षांची पावले पडत आहेत. भारतीय राजकारण आता गतिमान होत चालले आहे. एका नव्या उत्कंठापर्वात प्रवेश होत आहे\nसिद्धूचे पाक लष्करप्रमुखांना अलिंगन\nनवी दिल्ली : पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला काँग्रेसचे नेते व भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांना खास आमंत्रण होते....\nKerala Floods : केरळमध्ये मदतीसाठी 38 हेलिकॉप्टर, शेकडो बोटी\nकोची : केरळमध्ये यंदाच्या शतकातील सर्वांत मोठी पूर आला असून, पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी तब्बल 38 हेलिकॉप्टर आणि शेकडो बोटी कार्यरत आहेत...\n'एक धागा शौर्य' का सैनिकांसाठी जुन्नरच्या विद्यार्थ्यांनीचा अभिनव उपक्रम\nजुन्नर - सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांसाठी जुन्नरच्या शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थिनींनी 'एक धागा शौर्य'का हा अभिनव...\nएमआयएम नगरसेवक मतीन यांना अटक\nऔरंगाबाद- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला नकार देणारे औरंगाबादमधील एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना आज अटक करण्यात...\nभाषणात मोठी ताकद आहे.. : बबन साळगांवकर\nसावंतवाडी : भाषणात मोठी ताकद आहे त्याच वक्तृत्वाचा फायदा घेऊन तब्बल 23 दिवसांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे पहिल्यांदा आमदार बनले आणि त्यांनी नंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-teacher-transfer-and-student-strike-55581", "date_download": "2018-08-18T10:50:46Z", "digest": "sha1:SF7NXIF4K6NRI6NOVD5KLLLEFGDGWRSG", "length": 12290, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgaon news teacher transfer and student strike शिक्षकाची बदली रद्दसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन | eSakal", "raw_content": "\nशिक्षकाची बदली रद्दसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन\nमंगळवार, 27 जून 2017\nजळगाव : शारदा माध्य विद्यालय (कळमसरे) येथील शिक्षक एस. एफ. पावरा यांची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु असून, विद्यार्थिनी चक्कर येऊन पडल्या आहेत.\nजळगाव : शारदा माध्य विद्यालय (कळमसरे) येथील शिक्षक एस. एफ. पावरा यांची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु असून, विद्यार्थिनी चक्कर येऊन पडल्या आहेत.\nविद्यार्थ्यांसह पालकांनी या आंदोलनात भाग घेतला असून, सस्थाचालकांची हुकुमशाही चालणार नाही असे म्हणत आंदोलन चिघळले आहे. पावरा यांची बदली ही संस्थेअंतर्गत झाली असून, ती बदली रद्द करण्याचा अधिकार पूर्ण संस्थेला आहे. त्यामुळे संस्था चालक काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांनी प्रार्थनेवरही बहिष्कार टाकला आहे. मारवड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.\nविद्यार्थीनी चक्कर येऊन पडल्या\nविद्यार्थ्यांचे आंदोलन तिव्र झाले असून, विद्यार्थिनी चक्कर येवून पडल्या आहेत. उपचारासाठी त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात मनीषा रणजितसिंग पाटील, रुचिता प्रकाश कुंभार, धनश्री विजय चौधरी, गायत्री हेमंत पाटील (सर्व वय 13), हर्षदा रणछोड पाटील (12), नेहा मोहन चौधरी (13) विद्या युवराज पाटील (10) या विद्यार्थिनी आहेत.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\nकट्टर मुस्लिम दहशतवाद संपवून टाकू; मोदी-ट्रम्प यांचे संयुक्त निवेदन\nपुणे: चार धरणांत मिळून 0.12 टीएमसीने वाढ​\nमाण: बोअरवेलमध्ये पडलेल्या मंगेशचा अखेर मृत्यू\nसलाहुद्दीनला ठरविले जागतिक दहशतवादी​\nसर्जिकल स्ट्राइकवर एकही प्रश्‍न नाही: नरेंद्र मोदी​\nमुख्यमंत्र्यांना विठ्ठल पूजेपासून रोखणार​\nशाहू कार्यात तंत्रज्ञानाधारित रोजगाराची बीजं - डॉ. रघुनाथ माशेलकर​\n३१ दिवस, पावणे चारशे तास आणि ४६ हजार पोळ्या​\nपिंपरी - दोन मुलांना मारून वडिलांची आत्महत्या\nपिंपरी (पुणे) - दोन मुलांना मारून वडिलांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना शनिवारी दुपारी ताथवडे येथे घडली. शुभम बर्मन (वय १०) रूपम वर्मा (वय...\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nऔरंगाबाद : 'एमआयएम'च्या नगरसेवकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा\nऔरंगाबाद : महापालिकेत एमआयएम नगरसेकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या पाच नगरसेवकांविरोधात शुक्रवारी (ता.17) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयएम नगरसेवक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://info-4all.ru/mr/%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8B/towari-i-uslugi/", "date_download": "2018-08-18T10:00:56Z", "digest": "sha1:KLJ25PERQPF3VGV3KPL5W33UJ2JI4TF6", "length": 21370, "nlines": 328, "source_domain": "info-4all.ru", "title": "Rubric: वस्तू आणि सेवा - सर्व उपयुक्त माहिती", "raw_content": "\nजिज्ञासू आणि ज्ञानाबद्दल तहान\nसेवा, काळजी आणि दुरुस्ती\nसेक्युलर लाइफ आणि शोबनेस\nजन्मकुंडली, जादू, दैव सांगणे\nफोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग\nव्हिडिओ रेकॉर्डिंगची प्रक्रिया करणे\nछायाचित्रं प्रसंस्करण आणि छपाई\nउत्पादने खरेदी आणि निवड\nइतर भाषा आणि तंत्रज्ञान\nप्रकाशने आणि लेखन लेख\nस्थायी निवास, स्थावर मालमत्ता\nशहरे आणि देशांविषयी इतर\nहवामान, हवामान, वेळ क्षेत्र\nलेखन पुन्हा सुरू करा\nबदला आणि नोकरी शोधा\nपाळीव प्राण्यांना अनुमती आहे\nइतर आरोग्य आणि सौंदर्य\nकाय आहे आणि कसे करावे\nRubric: वस्तू आणि सेवा\nमेगाफोन अतिरिक्त काढतो. क्षेत्र बदलताना \"सर्व समाविष्ट एल\" वर शुल्क\nमेगाफोन अतिरिक्त काढतो. क्षेत्र बदलताना \"सर्व समाविष्ट एल\" वर शुल्क होय, ते करतो. आता जेव्हा आपण आपल्या होम नेटवर्कचे कव्हरेज क्षेत्र सोडता, परंतु रशियन फेडरेशनच्या प्रांतात राहू देता, तेव्हा \"सर्व समावेशी\" दर लागू होतो ...\nमित्राच्या दुकानात कसे ठसावे\nएक मस्करी दुकान कसा साधावा विविध विनोदांच्या स्टोअरमध्ये खरेदीदारांचे बल्क सामान्य लोक आहेत, किंवा फक्त असामान्य मित्रांसाठी काहीतरी विकत घेण्यासाठी लोक म्हणूनच नाव निवडले पाहिजे ...\nकृत्रिम ख्रिसमस झाडं काय आहेत\nकृत्रिम ख्रिसमस झाडं काय आहेत कृत्रिम ख्रिसमस पे पीवीसी चित्रपटातून तयार केले जातात, जे कापले जाण्याआधी, पाइन्स विशिष्ट रंगांच्या विशेष रेषेपासून बनविले जातात, आणि कृत्रिम ख्रिसमस झाडांना मऊ केले जातात ...\nलाळेच्या नरमतेने टूथब्रशवर मार्किंग काय आहे\nलाळेच्या नरमतेने टूथब्रशवर मार्किंग काय आहे मी मध्यम कडक brushes पसंत, मध्यम लेबल, मी अगदी हार्ड विषयावर दिसत नाही, आणि मी कारण माझे पती अपवादात्मक मऊ (मऊ) खरेदी ...\nताणून काढणारी फिल्म म्हणजे काय मला एका ताणून फिल्मची आवश्यकता का आहे मला एका ताणून फिल्मची आवश्यकता का आहे त्याची किंमत किती आहे\nताणून काढणारी फिल्म म्हणजे काय मला एका ताणून फिल्मची आवश्यकता का आहे मला एका ताणून फिल्मची आवश्यकता का आहे त्याची किंमत किती आहे त्याची किंमत किती आहे पॅचिंगसाठी स्ट्रेच फिल्मचा वापर केला जातो बर्याच पर्याय आहेत, परंतु या प्लेटच्या अरुंद भागामध्ये एका विट्याच्या कारखान्यात मी तुम्हाला एक देऊ करतो, एक विटा (इथला) एक गवत (आणि हे एक हजार तुकडे आहेत) आणि ...\nएक पार्सल आला, जे मी ऑर्डर केले नाही मी काय करावे\nएक पार्सल आला, जे मी ऑर्डर केले नाही मी काय करावे फक्त पार्सल प्राप्त होत नाही, ती परत पाठविली जाईल. नुकतीच मला माझ्या पत्त्यावर नोटीस मिळाली आहे, परंतु दुसर्या कोणाचे तरी शेवटचे नाव. मी गेलो ...\nमी एक विस्तार केबल द्वारे रेफ्रिजरेटर कनेक्ट करू शकता\nमी एक विस्तार केबल द्वारे रेफ्रिजरेटर कनेक्ट करू शकता नक्कीच आपण हे करू शकता, हे सर्वात चांगले कार्य करते आणि ते ठीक आहे जर फ्यूजसह एक नेटवर्क फिल्टर असेल तर, त्यानंतर 2 मधील लोडसह अशी एक फिल्टर कॉल्स ...\n17 वर्ग मीटर प्रति रूम किती वॉलपेपरचे तुकडे आवश्यक आहेत\n17 वर्ग मीटर प्रति रूम किती वॉलपेपरचे तुकडे आवश्यक आहेत भिंतीची उंची आणि आपण त्याची गणना करू शकता त्याची माहिती समजून घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, उंची 2,5 आहे, नंतर एका रोलपासून 4 भाग प्राप्त होईल. 17mxNUMX ...\nडिस्काउंट कार्ड \"चहाचे एबीसी\" कसे मिळवावे\nडिस्काउंट कार्ड \"चहाचे एबीसी\" कसे मिळवावे इतर बर्याच स्टोअरप्रमाणे, \"चवचे एबीसी\"; ग्राहकांना सवलत कार्ड देखील देऊ शकतात. 04 एप्रिल 2016 वर्षा पूर्वी जारी केलेले सर्व कार्ड ...\n\"स्पोर्ट मास्टर\" स्टोअरच्या नकाशावर किती बोनस (गुण) शोधून काढायचे\n\"स्पोर्ट मास्टर\" स्टोअरच्या नकाशावर किती बोनस (गुण) शोधून काढायचे स्पोर्टमास्टर स्टोअरच्या साइटवर, क्लब कार्डाच्या बॅलेन्सच्या क्लब कार्डावर समर्पित असलेल्या विभागात जाणे आवश्यक आहे. तेथे आपल्याला नंबर प्रविष्ट करावा ...\nबाटल्यांमध्ये वाइन पासून टेटॅपरॅकमध्ये वाइन कशासाठी वेगळे आहे\nबाटल्यांमध्ये वाइन पासून टेटॅपरॅकमध्ये वाइन कशासाठी वेगळे आहे होय, काहीही वेगळे नाही, किंमत कमी आहे, कारण tetra-packets स्वतः स्वस्त आहेत, काचेच्या बाटल्या अधिक महाग आहेत. याशिवाय, हे आहे ...\nलग्न कपडे वर तेथे हंगाम सवलत आहेत\nलग्न कपडे वर तेथे हंगाम सवलत आहेत ते स्वस्त असताना सिध्दांत, सवलत वर्षाच्या शेवटी असावी. जवळपास नोव्हेंबर पासून तो लग्न कपडे वर सवलत असू शकते की मला दिसते ...\nआपल्या शहरातील चॉकलेट बार (शहर, किंमत) किती आहे\nआपल्या शहरातील चॉकलेट बार (शहर, किंमत) किती आहे उदाहरणार्थ यकुटस्क चॉकलेट बारमध्ये उदाहरणार्थ अल्पेन सोना 50 आरआर. rteter खेळात 100 रौद्र हे सर्व उत्पादकवर अवलंबून असते. विमानतळावर असेच ...\nअनेक पॅकेजेसवरील ईएसी लेबल म्हणजे काय\nअनेक पॅकेजेसवरील ईएसी लेबल म्हणजे काय ईएसी चिन्ह याचा अर्थ असा आहे की हे उत्पादन युरियन कस्टम्स युनियनची आवश्यकता पूर्ण करते आणि प्रमाणन उत्तीर्ण झाले आहे. संक्षिप्त EAC याचा अर्थ \"यूरेशियन अनुपालन\" आहे. या संघात ...\nपृष्ठ 1पृष्ठ 2...पृष्ठ 209पुढील पृष्ठ\nलोड करीत आहे ...\n© कॉपीराइट 2017 - प्रत्येकासाठी उपयुक्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/exclusive/4998-baban-team-celebrate-holi-with-mud-dhulivandan", "date_download": "2018-08-18T10:36:30Z", "digest": "sha1:4VA6HIDDZUU5HOS37FXJ543RH5X3F6TY", "length": 12002, "nlines": 228, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'बबन' टीमने साजरी केली चिखलाची अनोखी 'धुळवड' - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'बबन' टीमने साजरी केली चिखलाची अनोखी 'धुळवड'\nPrevious Article 'जागतिक महिला दिवस' निमित्ताने कलर्स मराठीवरील लाडक्या कलाकारांचे मोलाचे सल्ले\nNext Article नव्या दमाचा नव्या युगाचा गीतकार - 'गणेश साबळे'\nधुळवड म्हणजे रंगाचा खेळ, रंगाची उधळण करणा-या या उत्सवाचा नुकताच 'बबन' सिनेमातील संपूर्ण टीमने एका वेगळ्याच प्रकारे आनंद लुटला. होळीच्या मुहूर्तावर अहमदनगर येथील म्हसे गावात पार पडलेल्या या उत्सवामध्ये चिखलाची अनोखी 'धुळवड' साजरी करण्यात आली.\nPhotos - 'बबन' ने साजरी केली सुपरहिट नॉनस्टाॅप ५० ची सक्सेस पार्टी\nसुपरहिट 'बबन' पोहोचला सिंगापूरला\nसुपरहिट 'बबन' ने गाठला दहा दिवसांमध्ये ८.५ कोटीचा पल्ला\nसंपूर्ण महाराष्ट्रात गाजतोय 'बबन'\nआगामी ‘बबन’ सिनेमावरचे ‘मेकिंग ऑफ बबन’ पुस्तक प्रकाशित\nविशेष म्हणजे, आतापर्यंत साजरा करण्यात आलेल्या इको फ्रेंडली रंगपंचमीतल्या या अनोख्या धूळवडीचा स्थानिक नागरिकांनीदेखील मनसोक्त आनंद लुटला. द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तुत आणि चित्राक्ष फिल्म्स निर्मित या सिनेमाचे राष्ट्रीयपुरस्कार प्राप्त 'ख्वाडा' फेम दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी दिग्दर्शन केले आहे. या सिनेमाच्या मोशन आणि टीझर पोस्टरवर देखील दोन प्रेमीयुगुल चिखलाने माखले असल्याचे दिसून येते. याचाच संदर्भ घेत अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील म्हसे गावात अनेक प्रेमी जोडप्यांना घेऊन चिखलातील अनोखी धुळवड साजरी करण्यात आली. याबद्दल बोलताना सिनेमाचे दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे सांगतात की, 'महाराष्ट्र हा कृषिप्रधान राज्य असून, शेतकऱ्याला येथे महत्वाचे स्थान आहे.शिवाय प्रत्येक शेतकऱ्याची नाळ आपल्या मातीशी जुळलेली असते. गावच्या मातीच्या रंगाची आणि सुगंधाची तोड इतर कोणत्याही रंगात नसल्यामुळे, आपल्या मातीशी एकरूप होण्यासाठी अशी इतरांहून वेगळी 'धुळवड' साजरी करण्याचे आम्ही ठरवले'. कुतूहलाची गोष्ट म्हणजे, चिखलात रंगपंचमी खेळण्याची म्हसे गावक-यांची ही प्रथा असून, आसपासचे गाव विविध रंगात न्हात असताना, इथे गावरान मातीच्या चिखलात ग्रामस्थ स्वतःला झोकून देतात, अशी माहिती समोर आली आहे.\nग्रामस्थांसमवेत पारंपारिक पद्धतीत साजरी झाली 'होळी'\nधुळवडीच्या या अनोख्या पद्धतीबरोबरच पारंपारिक 'होळी' दहनाचा कार्यक्रमदेखील येथे पार पडला. म्हसे ग्रामस्थांचा सहभाग लाभलेल्या या 'होळी' उत्सवामध्ये लेझीमचा तालदेखील स्थानिकांनी धरला.\n'बबन' हा सिनेमा २३ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून, भाऊरावांनी या सिनेमाचे लेखनदेखील केले आहे. 'ख्वाडा' अभिनेता भाऊसाहेब शिंदेची यात प्रमुख भूमिका असून गायत्री जाधव ही नवोदित अभिनेत्री 'बबन' मध्ये झळकणार आहे. विठ्ठलराव कऱ्हाडे, प्रमोद भास्कर चौधरी, मोनाली संदीप फंड आणि भाऊसाहेब शिंदे या चौकडीने सिनेमाच्या निर्मात्याची धुरा सांभाळली असून, हा सिनेमा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची परिपूर्ण मेजवानी ठरणार आहे.\nPrevious Article 'जागतिक महिला दिवस' निमित्ताने कलर्स मराठीवरील लाडक्या कलाकारांचे मोलाचे सल्ले\nNext Article नव्या दमाचा नव्या युगाचा गीतकार - 'गणेश साबळे'\n'बबन' टीमने साजरी केली चिखलाची अनोखी 'धुळवड'\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\nतीच धम्माल मस्ती घेऊन पुन्हा येतोय 'बॉईज 2' ५ ऑक्टोबरपासून\n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेमधील हरहुन्नरी लक्ष्मी म्हणजेच अभिनेत्री 'समृद्धी केळकर' झाली \"कथ्थक विशारद\"\n'अमेय वाघ' करणार 'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स' चं सूत्रसंचालन\n\"अंजली स्वीकारणार सईचं आव्हान\" - पहा 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेचा २ तासांचा विशेष भाग १९ ऑगस्टला\nSony Pictures Network चे मराठी मनोरंजन क्षेत्रातले पहिले पाऊल - Sony मराठी\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\nतीच धम्माल मस्ती घेऊन पुन्हा येतोय 'बॉईज 2' ५ ऑक्टोबरपासून\n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेमधील हरहुन्नरी लक्ष्मी म्हणजेच अभिनेत्री 'समृद्धी केळकर' झाली \"कथ्थक विशारद\"\n'अमेय वाघ' करणार 'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स' चं सूत्रसंचालन\n\"अंजली स्वीकारणार सईचं आव्हान\" - पहा 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेचा २ तासांचा विशेष भाग १९ ऑगस्टला\nSony Pictures Network चे मराठी मनोरंजन क्षेत्रातले पहिले पाऊल - Sony मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/laksh-carrier-exhibition-sakal-44281", "date_download": "2018-08-18T10:49:44Z", "digest": "sha1:6ZOZ52WEKYYVF3X2XNFNOH2LZTRWQTPC", "length": 15664, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "laksh carrier exhibition by sakal ‘सकाळ’तर्फे २४ पासून लक्ष्य करिअर प्रदर्शने | eSakal", "raw_content": "\n‘सकाळ’तर्फे २४ पासून लक्ष्य करिअर प्रदर्शने\nबुधवार, 10 मे 2017\nस्टॉल बुकिंगला प्रतिसाद - पुण्यातील क्रिएटिव्ह ॲकॅडमी मुख्य प्रायोजक\nकोल्हापूर - ‘करिअरिस्ट’ विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी काय आहेत, याची सर्वांगीण माहिती यंदाही लक्ष्य करिअर प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे. ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या वतीने २४ मेपासून या प्रदर्शनांना प्रारंभ होत असून, पाच जूनपर्यंत सांगली, कोल्हापूर आणि गडहिंग्लज या ठिकाणी प्रदर्शने होतील. स्टॉल बुकिंगला प्रारंभ झाला असून, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.\nस्टॉल बुकिंगला प्रतिसाद - पुण्यातील क्रिएटिव्ह ॲकॅडमी मुख्य प्रायोजक\nकोल्हापूर - ‘करिअरिस्ट’ विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी काय आहेत, याची सर्वांगीण माहिती यंदाही लक्ष्य करिअर प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे. ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या वतीने २४ मेपासून या प्रदर्शनांना प्रारंभ होत असून, पाच जूनपर्यंत सांगली, कोल्हापूर आणि गडहिंग्लज या ठिकाणी प्रदर्शने होतील. स्टॉल बुकिंगला प्रारंभ झाला असून, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.\nदरम्यान, पुण्यातील क्रिएटिव्ह ॲकॅडमी प्रदर्शनांचे मुख्य प्रायोजक आहे. आठवी ते बारावी सायन्स विद्यार्थ्यांसाठी शाळा-कॉलेजच्या अभ्यासासह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय करिअरसाठी संपूर्ण तयारी करून घेणारी ही संस्था गेली दहा वर्षे कार्यरत आहे. आठवीपासूनच आयआयटी फाउंडेशन तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षांची तयारी येथे करून घेतली जाते. त्याशिवाय इंजिनिअरिंग व मेडिकल प्रवेश परीक्षांची तयारीही येथे करून घेतली जाते.\nशैक्षणिक वर्ष संपल्यानंतर पुढे काय, असा प्रश्‍न बहुतांश विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतो. करिअरच्या दृष्टीने कोणत्या संधी उपलब्ध आहेत, नेमके कोणते कौशल्य हवे आणि त्यासाठी नेमके काय शिकायला हवे, या संभ्रमावस्थेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांसाठी अशा प्रदर्शनांची परंपरा ‘सकाळ’ने गेल्या काही वर्षांपासून सुरू केली आहे. त्याला प्रत्येक वर्षी भरघोस प्रतिसाद मिळत असून, यंदाही हे प्रदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांना ‘फॉर राइट चॉइस ऑन राइट टाइम’च ठरणार आहे.\nसंगणक, माहिती तंत्रज्ञान, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझाइन, अभियांत्रिकीच्या विविध शाखा, मेडिकल, ॲनिमेशन, बॅंकिंग आदी संस्थांचा समावेश असेल. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांचेही स्टॉल प्रदर्शनात असतील. त्याशिवाय इतर विविध विद्या शाखांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध क्‍लासेसचाही प्रदर्शनात समावेश असेल. प्रदर्शनाच्या कालावधीत करिअर मार्गदर्शन, शिक्षण संधी याबाबत व्याख्याने, चर्चासत्रे, समुपदेशन होणार आहे.\nएकाच ठिकाणी सर्वाधिक पालक व विद्यार्थ्यांपर्यंत विविध शैक्षणिक संधींचा खजिना खुला करण्यासाठी विविध संस्थांनाही हे प्रदर्शन पर्वणी ठरणार आहे.\nगडहिंग्लज- २४ ते २६ मे (यार्ती बिल्डिंग, आर. के. कॉम्प्लेक्‍सजवळ, कौलगे बाजार, भडगाव रोड, गडहिंग्लज)\nकोल्हापूर- ३० मे ते एक जून (हॉटेल पॅव्हेलियन, मधुसूदन हॉल, कोल्हापूर)\nसांगली- २ ते ५ जून (कल्पद्रुम ग्राउंड, नेमिनाथनगर, सांगली)\nअधिक माहितीसाठी संपर्क- गडहिंग्लज- अनिल मगदूम- ९८८११२९२२७, कोल्हापूर- विजय शिंदे- ९९२२४१६०५५, संतोष पाटील- ९९७५५१३९५१, सांगली- परितोष भस्मे- ९७६६२१३००३, राहुल- ९८२२५३३४५५.\nMaratha Kranti Morcha : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री आंदोलन\nपुणे : मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे सोमवारपासून (ता.20) मराठा आरक्षणासाठी आणि विविध मागण्यांसाठी पुणे विभागीय आयुक्त...\nभाषणात मोठी ताकद आहे.. : बबन साळगांवकर\nसावंतवाडी : भाषणात मोठी ताकद आहे त्याच वक्तृत्वाचा फायदा घेऊन तब्बल 23 दिवसांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे पहिल्यांदा आमदार बनले आणि त्यांनी नंतर...\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nऔरंगाबाद : 'एमआयएम'च्या नगरसेवकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा\nऔरंगाबाद : महापालिकेत एमआयएम नगरसेकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या पाच नगरसेवकांविरोधात शुक्रवारी (ता.17) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयएम नगरसेवक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2018-08-18T09:57:20Z", "digest": "sha1:HQEA5FIVF73TZCVDXGXOYJ2SRYGFPPCX", "length": 6490, "nlines": 173, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इशिकावा - विकिपीडिया", "raw_content": "\nइशिकावा प्रभागचे जपान देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ४,१८५.२ चौ. किमी (१,६१५.९ चौ. मैल)\nघनता २७९.३ /चौ. किमी (७२३ /चौ. मैल)\nइशिकावा (जपानी: 石川県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग होन्शू बेटावरील चुबू ह्या प्रदेशामध्ये वसला आहे.\nकनाझावा ही इशिकावा प्रभागाची राजधानी आहे.\nविकिव्हॉयेज वरील इशिकावा प्रभाग पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nजपानचे प्रदेश व प्रभाग\nअकिता · इवाते · ओमोरी · फुकुशिमा · मियागी · यामागाता\nइबाराकी · गुन्मा · कनागावा · चिबा · तोक्यो · तोचिगी · सैतामा\nइशिकावा · ऐची · गिफू · तोयामा · नागानो · निगाता · फुकुई · यामानाशी · शिझुओका\nओसाका · क्योतो · नारा · मिई · वाकायामा · शिगा · ह्योगो\nओकायामा · तोतोरी · यामागुची · शिमाने · हिरोशिमा\nएहिमे · कागावा · कोची · तोकुशिमा\nक्युशू बेट: ओइता · कागोशिमा · कुमामोतो · नागासाकी · फुकुओका · मियाझाकी · सागा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%A3/", "date_download": "2018-08-18T10:52:16Z", "digest": "sha1:FJYKM2PUQBCVIEJROLMZKRXHCISQT7AQ", "length": 7949, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तापमान वाढणार, पाऊसही पडणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतापमान वाढणार, पाऊसही पडणार\nपुणे- पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात मंगळवारपर्यंत (दि. 17) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान रविवारीही मराठवाड्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला.\nराज्यातील उन्हाचा चटका वाढला असून, रविवारी (दि.15) सकाळपर्यंत मालेगाव येथे उच्चांकी 42.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मंगळवारनंतर राज्याच्या तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्‍यता आहे.\nदक्षिण कर्नाटक ते केरळपर्यंत वाऱ्यांच्या प्रवाह खंडित झालेले आहे. तर नैऋत्य मध्यप्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीपासून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात पाऊस पडण्यासाठी पोषक स्थिती निर्माण होत आहे. रविवारी दुपार नंतर मराठवाड्यातील तुळजापूर, यवतमाळ या भागात जोरदार पाऊस पडला. काही ठिकाणी तर वादळी पाऊस झाला. पुण्यातही दुपारनंतर काही काळ ढगाळ वातावरण अनुभवायला मिळाले.\nमंगळवारपर्यंत (दि.17 ) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे. दरम्यान, राज्यात गेले दोन दिवस मुख्यत: कोरडे हवामान असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात कमाल तापमान 37 अंश ते 41 अंशांच्या आसपास, तर कोकणात 31 ते 33 अंशांच्या जवळपास आहे.\nनाशिक,37.6, नागपूर, 39.7, औरंगाबाद, 39.0 नांदेड 40.0,सांगली38.4,सातारा 38.6,परभणी 41.7\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleडॉल्बीचा नाद करायचा नाय…\nNext articleसातारा : स्टेअरिंग लॉक झाल्याने जीपला अपघात\nसारथी उपक्रमातून 5 लाख लोकांचे शंका निरसन\nपुणे – दोनशेहून अधिक जणांकडून दावे दाखल\n“भुक मुक्त’ पुण्यासाठी स्मार्ट सिटीचा पुढाकार\nकचरा प्रकल्पांची क्षमता वाढवा\n24 तासांमध्ये मिळणार वीजग्राहकांना संपूर्ण माहिती\nअजित पवार यांनी घेतला जिल्हा परिषदेच्या कारभाराचा आढावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/citizen-journalism/police-break-rules-121373", "date_download": "2018-08-18T10:57:14Z", "digest": "sha1:F3J5GYUGJAP5YL7ASTQHY7JS2ZYX2HYP", "length": 9426, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "police break the rules पोलिसच नियम मोडतात | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 4 जून 2018\nपुणे : गुरुवारी (ता. ३१) सकाळी ११:३० च्या आसपास येरवड्यातील शादवल बाबा चौक येथील सिग्नल लाल असताना पोलिसांनीच गाडी झेब्रा पट्ट्यांवर थांबवली आहे. जर कायदा पाळायला सांगणारेच कायदा मोडत असतील तर त्यांना शिक्षा कोण करणार अश्या बेजबाबदार आणि बेशिस्त पोलिसांमुळे पूर्ण खाते बदनाम होत आहे.\nपुणे : गुरुवारी (ता. ३१) सकाळी ११:३० च्या आसपास येरवड्यातील शादवल बाबा चौक येथील सिग्नल लाल असताना पोलिसांनीच गाडी झेब्रा पट्ट्यांवर थांबवली आहे. जर कायदा पाळायला सांगणारेच कायदा मोडत असतील तर त्यांना शिक्षा कोण करणार अश्या बेजबाबदार आणि बेशिस्त पोलिसांमुळे पूर्ण खाते बदनाम होत आहे.\nMaratha Kranti Morcha : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री आंदोलन\nपुणे : मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे सोमवारपासून (ता.20) मराठा आरक्षणासाठी आणि विविध मागण्यांसाठी पुणे विभागीय आयुक्त...\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून सहाजण जखमी\nबेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने बंगळूरकडे जाणारी व्हीआरएलची आराम बस उलटून चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय...\nघरकामगार, बांधकाम मजूर महिलांची उपेक्षाच\nजळगाव : दिवसरात्र काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, पण डोक्‍यावर हक्काचं छत नाही...सतत कष्ट करूनही पदरी काहीच न पडल्यामुळे अनेकदा उपवास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://shatadapremkarave.blogspot.com/2011/03/blog-post.html", "date_download": "2018-08-18T10:48:11Z", "digest": "sha1:VOBQHYZ54DFFE6OALXDDTMRS5QO6HLKI", "length": 3192, "nlines": 93, "source_domain": "shatadapremkarave.blogspot.com", "title": "शतदा प्रेम करावे: असाही पाउस ...", "raw_content": "\nनमस्कार मित्रानो. मी अनिल बिहाणी . मझ्याबाबातीत सांगण्यासारखे विशेष काहिच नाहि.मी एक् सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य मुलगा आहे.पण प्रत्येक समान्यात कुठे तरि असामन्यत्व द्डलेलं असतं.माझ्यातल्या या असामान्यत्वाचा शोध् घेणे सद्या सुरु आहे.\nआभाळभर निला रंग मारताना\nएका कटाक्षा करीता आसुसलेल्या\n\"त्याची \" याचना करीत\nतिने हलकेच वर पाहिले\nपाउस धन्य झाला .\nजय हो तेरी गोविंदा ......\nक्षण जे उरले काही............\nसांज जराशी ढळली .......\nही वाट दूर जाते .......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://jaaeechipaane.wordpress.com/category/%E0%A4%AD%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-08-18T10:07:19Z", "digest": "sha1:VSAA3ORXIAGRLAE2BKDTOHFLCTBFODHZ", "length": 17387, "nlines": 37, "source_domain": "jaaeechipaane.wordpress.com", "title": "भटकंती | जाईची पाने", "raw_content": "\nकाल जवळजवळ एक महिन्यानी मी क्रॉयडनच्या बाहेर जात होते फिरायला थंडी आणि पाऊस यामुळे गेले काही शनिवार, रविवार आम्ही कुठे फिरायला बाहेर पडलो नव्हतो. काल अचानक आमचं टॉवर ऑफ लंडन बघायला जायचं ठरलं आणि आम्ही १०.३० च्या आसपास बाहेर पडलो. पावसाची रिपरीप सुरुच होती पण बरेच दिवसानी बाहेर पडलो होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोहिनूर ज्याच्याबद्दल फक्त वाचायला आणि ऐकायला मिळतं तो आज प्रत्यक्षात बघायला मिळणार होता याचा उत्साह होता. या उत्साहात आम्ही टॉवर ऑफ लंडनला पोहचलो. एंन्ट्री फि, तिकिट या सगळ्याचे सोपस्कार आटोपून एकदाचे आम्ही टॉवर ऑफ लंडन म्हणजे त्या किल्ल्यात शिरलो. टॉवर ऑफ लंडन ची माहिती द्यायला तिथे गाइड आहे जो सुरवातीला तुम्हाला त्या किल्ल्याचा थोडक्यात इतिहास सांगतो, तिथल्या अनेक टॉवर बद्दल माहिती देतो. नंतर आपण तो किल्ला आणि तिथले टॉवर आतून फिरून बघायचे. त्याची सांगण्याची पध्दत इतकी मस्त आणि मजेदार होती कि त्याच बोलण ऐकत रहावं असं वाटतं होत.\nटॉवर ऑफ लंडन हा बऱ्याच छोट्या मोठ्या टॉवरनी बनलेला किल्ला आहे जो थेम्स नदीच्या किनारी इ.स. १०७८ साली बांधला आहे. हा किल्ला व्हाइट टॉवर म्हणूनही ओळखला जातो. ह्या किल्ल्याच्या अग्रभागी असणाऱ्या पांढऱ्या टॉवरवरून हि ओळख निर्माण झाली. हा किल्ला मुख्यत्त्वे तुरूंग म्हणून वापरला जायचा. इथे बऱ्य़ाच राजघराण्यातील व्यक्तिंना बंदिवान म्हणून ठेवल गेल, मृत्यूची शिक्षा दिली गेली, त्यांचा शिरच्छेद केला गेला. इथे छोटे मोठे एकूण २०-२१ टॉवर आहेत (गाइडने दोनदा सांगितलं तरी मी नक्की संख्या विसरले :(). सर्वात प्रथम आम्ही क्राउन ज्युवेल्स ठेवलेल्या इमारतीमध्ये (वॉटर्लू ब्लॉक) शिरलो. तिथे सर्व किंमती दागिने ठेवले आहेत जे पूर्वीपासून राज्याभिषेकासाठी (कोरोनेशनसाठी) वापरले गेले आहेत. यामध्ये सर्व सोन्याचांदीची भांडी, हिऱ्य़ांचे दागिने, हिऱ्यामोत्यानी सजवलेली शाही तलवार असं बरंच काही आहे (जे आपण फक्त आ वासून बघत राहतो). ह्यामधे कोहिनूर हिरा जो सध्या क्वीन मदरच्या क्राऊनमधे आहे, जगातला पहिला सापडलेला सर्वात मोठा कलिनल १ हिरा ज्याला फर्स्ट स्टार ऑफ आफ्रिका म्हटलं जात आणि जो सध्या शाही सेप्टर मधे बंदिस्त आहे. अशा सगळ्या अगणित किंमती हिऱ्य़ांना बघून, आणि खरंतर आपल्या भारताच्या (जो आता भारताचा नाही रहिला) कोहिनूर हिऱ्याला पाहून मस्त वाटलं.\nहे सगळे दागदागिने मनसोक्त पाहून आम्ही व्हाइट टॉवर मधे गेलो. सर्वात पहिला बांधलेला आणि सर्वात मध्यभागी असणारा हा टॉवर आहे. ह्यावरूनच टॉवर ऑफ लंडनला व्हाइट टॉवर म्हटलं जातं. हा तिथला सगळ्यात मोठा टॉवर आहे. हा टॉवर विल्यम नावाच्या नॉर्मन राजाने बांधला आहे. या टॉवरच्या सगळ्यात शेवटच्या मजल्यावर शाहिपरिवार रहात असे. सध्या या टॉवरमधे पूर्वी वापरली जाणारी आयुधे जसे बंदूक, तोफा, तलवारी, पूर्वीची नाणी आणि टॉवर ऑफ लंडनची पहिल्या इमारतीपासून आतापर्यंतच्या बांधकामाच्या प्रतिकृती आहेत. त्यानंतर आम्ही वेकफिल्ड टॉवरमधे गेलो तिथून लंन्थॉर्न टॉवर, कॉन्स्टेबल टॉवर, सॉल्ट टॉवर असे काही टॉवर जे व्हाइट टॉवरच्या बाजूने बांधले आहेत ते पाहिले. तिथे रेवन नावाचा एक पक्षी (मोठा कावळा) आहे ज्याच्याबद्दल आम्हाला गाइडने एक कथा सांगितली ती अशी की हा पक्षी जर इथून गेला तर साम्राज्य आणि टॉवर दोन्ही नष्ट होतील. हे उडून जाऊ नयेत म्हणून त्यांची काही पिसे काढली जातात. हा पक्षी जर इथे राहिला तर तो जवळपास ३० वर्षे जगतो, बाहेर या पक्ष्याचे आयुर्मान फक्त १५ वर्षे असते.\nहे सगळं बघत असताना आम्हाला भुकेची जाणीवच राहिली नव्हती, पण आता ती होत होती. अशाप्रकारे इतिहासाचा एक मोठा साक्षीदार असलेला, सुंदर बांधकामाचा एक नमूना असलेला आणि व्यवस्थित जतन करून ठेवलेला असा किल्ला “टॉवर ऑफ लंडन” बघून आम्ही आमची पोटपूजा करायला तिकडून बाहेर पडलो.\nइकडे लंडनमधे बरेचदा रेस्टॉरंट्सशी संबधित एक विशेषण ऐकायला मिळतं, “मिशलिन स्टार”. ३ स्टार, ५ स्टार हे मी ऐकलं होतं पण मिशलिन स्टार हे माझ्यासाठी नवीन होतं, मग हा काय प्रकार आहे हे मी आंतरजालावर पहायच ठरवलं आणि त्यातून मला जे मिळाल ते मी इकडे थोडक्यात लिहिते आहे.\nमिशलिन स्टारचं उगमस्थान आहे मिशलिन गाईड जे मिशलिनतर्फे प्रकाशित होतं. मिशलिन ही फ्रान्सची जगातील एक मोठी टायर निर्माती कंपनी आहे जी मिशेल ब्रदर्सनी १८८८ मधे सुरू केली. मिशलिन गाईड ही जगातल्या मोठ्या मोठ्या देशांवर लिहिलेली पुस्तके आहेत ज्यामध्ये गाडी चालकांसाठी गाडीच्या संदर्भात उपयोगी माहिती, प्रवासादरम्यान लागणाऱ्या राहाण्या, खाण्याच्या व्यवस्थेसंदर्भात मार्गदर्शन, पर्यटन इ. संदर्भात लिहील जातं. हे गाईड प्रथम फ्रान्स या देशाबद्दल लिहीलं गेलं. त्यामधे मिशलिन रेड गाईड आणि मिशलिन ग्रीन गाईड असे दोन प्रकार आहेत, त्यातील मिशलिन रेड गाईड, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स ना त्यांच्या जेवणाच्या दर्जानुसार मिशलिन स्टार बहाल करतं. मिशलिन रेड गाईड कडून निनावी परिक्षण केलं जातं आणि त्याच्या आधारावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स ना स्टार बहाल केला जातो. तो दर्जा, स्तर तसाच रहावा यासाठी त्यांच्याकडून दर १८ महिन्यानी स्टार दिलेल्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची तपासणी केली जाते. हे सर्व गाड्यांच्या मालकांसाठी, गाड्यांच्या इतर माहितीसोबत प्रवासादरम्यान जेवण्याखाण्याचीही योग्य माहिती मिळावी हा यामागचा हेतू.\nहे गाईड १९०० पासून प्रकाशित केलं जाऊ लागलं आणि १९२६ पासून स्टार देण्याची पद्धत सुरू झाली. सुरवातीला चांगल्या जेवणाच्या आधारावर फ़क्त १ स्टार दिला जायचा, २ आणि ३ स्टार द्यायला १९३० च्या दरम्यान सुरवात झाली, १९५५ नंतर जेवणाच्या किंमतीही ग्राह्य धरल्या जाऊ लागल्या. सध्या जेवणाच्या श्रेष्ठतेच्या तसेच उचित किंमतीत चांगलं जेवण या आधारावर १ ते ३ मिशलिन स्टार दिले जातात. उचित किंमतीत चांगल जेवण देणाऱ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना “बिग गोरमांड(Big Gourmand)” अस संबोधन दिल जातं. तर जी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स स्टार किंवा बिग गोरमांड या प्रकारात बसत नाहीत त्याना “फोर्क्स ऍंड नाइव्स” हे मोजमाप लावल जात. १ फोर्क्स ऍंड नाइव्स म्हणजे बऱ्यापैकी रेस्टॉरंट तर ५ फोर्क्स ऍंड नाइव्स हे एकदम मस्त रेस्टॉरंट, त्यात आणखी भर म्हणजे जर फोर्क्स ऍंड नाइव्स लाल असतील तर ते रेस्टॉरंट आरामशीर आहे अस समजावं. पण ह्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाकघर, जे त्यांच्या नियमानुसार एकदम व्यवस्थित, स्वच्छ असलं पाहिजे. ह्या शिवाय हॉटेल्स आणि रेस्टॉरंट स्वतंत्ररीत्या दुसरी काही रेटिंग्स मिळवू शकतात जस “कॉइन्स” जे मेन्युच्या किंमतीवरून दिलं जातं. तसच इटरेस्टिंग व्ह्यु किंवा मग्निफ़ि्शियंट व्ह्यु ज्यासाठी काळा किंवा लाल रंग दिला जातो जो त्या हॉटेलच्या भोवतीच्या नजाऱ्यावरून ठरवला जातो. तसच उच्चप्रतीची आणि चांगली वाईन देणाऱ्या रेस्टॉरंट्सना द्राक्षांचं मानांकन दिलं जातं.\nह्या मिशलिन रेटिंग पद्धतीवर टीकाही केलेली आढळते. एक कारण असं की मिशलिन गाईडचा उगम फ्रान्समधला असल्यामुळे ह्या गाईडच्या रेटिंग पद्धती फ्रेंच जेवणाशी आणि सादरीकरणाशी निगडीत आहेत अस अमेरीकन जेवण समीक्षकांच(फ़ुड क्रिटिक) मत आहे. सध्या या लाल रंगाची गाईड्स फ़्रान्स, ऑस्ट्रिया, नेदरलॅंड्स, बेल्जियम, इट्ली, जर्मनी, युके ऍंड आर्यलॅंड, स्पेन, स्वित्झरलॅंड या देशांवर प्रकाशित झालेली आहेत. तर युरोपच्या बाहेर ती न्यूयॉर्क सिटी, सॅन्फ्रान्सिस्को, टोकियो, लास वेगास आणि लॉस ऍंन्जल्स साठी प्रकाशित झाली आहेत. नुकतीच ती हॉंगकॉंग आणि मकाऊ साठी सुद्धा प्रकाशित झाली आहेत. एकूणच हे मिशलिन स्टार म्हणजे एक वेगळच रसायन आहे असं वाचताना जाणवत होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/ratnagiri", "date_download": "2018-08-18T10:24:35Z", "digest": "sha1:O36FLHECAI6KSOW5VPWTZ6IIMM46NYWC", "length": 9908, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रत्नागिरी Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nमच्छीमार बंदी उठूनही मासेमारी ठप्पच परतावा नसल्याने मच्छिमार आर्थिक संकटात वादळी हवामानामुळे नौका बंदरातच योगेश मोहिते /रत्नागिरी मासेमारीवर घातलेली दोन महिन्यांची सरकारी बंदी उठली असली तरी मासेमारीला लगाम घालत निसर्गाने आपणच सर्वश्रेष्ठ असल्याचे दाखवून दिले आहे. 1 ऑगस्टपासून पांरपरिक मासेमारीला परवानगी मिळूनही खवळलेला समुद्र आणि जोरदार वाऱयांमुळे पंधरवडा उलटून गेला तरी मच्छिमारी ठप्पच आहे. त्यामुळे नारळी पौर्णिमेनंतरच खऱया अर्थाने ...Full Article\nतब्बल 1225 लिटर गावठी दारू जप्त\nरामपूर येथे पोलिसांची कारवाई गुहागरातून चिपळुणकडे सुरू होती वाहतूक, गाडीसह 2 लाख 63 हजाराचा मुद्देमाल जप्त, बेकायदेशीर दारू वाहतूकप्रकरणी तरूण ताब्यात वार्ताहर /मार्गताम्हाने गुहागर ते चिपळूण अशी गावठी ...Full Article\nखेर्डीत प्रभातफेरीतच शिक्षकाचा मृत्यू\nचिपळूण / प्रतिनिधी स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणानंतर काढण्यात आलेल्या प्रभात फेरीदरम्यान खेर्डी जि. प. उर्दूशाळेचे पदवीधर शिक्षक व उर्दू शिक्षक संघटनेचे पदाधिकारी मोहिद्दीन गुलाब हुसेन मुल्लाजी (48) यांचे हृदयविकाराच्या तीव्र ...Full Article\nठाण्यात खैर चोरी, कोलाडात कारवाई, सावर्डेत छापे\nलाकूड चोरी प्रकरणी इरफान खलपे ताब्यात ठाणे-कोल्हापूर वनविभागाचे सावर्डे परिसरात धाडसत्र मात्र, उत्पादकांकडे चोरीचा साठा नसल्याचे स्पष्ट ठाणे वनक्षेत्रपाल भडाळेंविरोधात व्यावसायीक आक्रमक वार्ताहर /सावर्डे ठाणे जिह्यातील शासकीय जंगलातील खैराची ...Full Article\nमहाड तालुक्यात अवैध कत्तलखान्यावर छापा\nप्रतिनिधी / महाड महाड तालुक्यांतील विन्हेरे विभागांमध्ये असलेल्या भोमजाई मोहल्ला येथील एका गोठय़ांत सुरु असलेला बेकायदेशीर कत्तलखाना पोलिसांनी उध्दवस्त केला. साडे पाचशे किलो गुरांचे मास, सात जीवंत गुरे, दोन ...Full Article\nडिझेल संपल्याने एस.टीचा बोजवारा\nतब्बल 170 फेऱया होत्या रद्द प्रवासी-विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल इंधन टँकरना आंदोलनाचा फटका प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरी एस. टी. आगारातील डिझेलचा साठा शनिवारी दुपारी संपल्याने ए.टी. सेवचा चांगलाच बोजवारा उडाला. डिझेल ...Full Article\nडोक्यात जांभा घालून सरपंच पत्नीची हत्या\nचिपळूणात कादवाडमधील घटना, चारित्र्याच्या संशयावरून कृत्य 24 तासांतील दुसऱया घटनेने चिपळूण हादरले, फरार पती पोलिसांच्या ताब्यात, प्रतिनिधी /चिपळूण कादवड येथील सरपंच पत्नीच्या डोक्यात जांभा दगड घालून तिची हत्या ...Full Article\nआरक्षणासाठी हजारो मराठा बांधव रस्त्यावर, शहरांसह गावांतील सर्व व्यवहार बंद, बाजारपेठांसह रस्त्यांवर शुकशुकाट, मोर्चाने महामार्ग ठप्प शाळा, महाविद्यालयांसह वाहतूकही बंद प्रतिनिधी /चिपळूण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरूवारी चिपळूण व खेडमध्ये ...Full Article\nरत्नागिरी विमानतळावरून यशस्वी ‘टेकऑफ’\nधावपट्टी नूतनीकरणानंतरची चाचणी सफल कोस्टगार्डच्या ‘डार्नियर’चे लँडींग तटरक्षक महानिरीक्षक चाफेकर यांची पाहणी तब्बल तीन वर्षांच्या खंडानंतर विमानतळ सेवेसाठी सज्ज प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरी विमानतळाच्या धावपट्टी नूतनीकरणाच्या कामामुळे गेल्या तीन वर्षांपासून ...Full Article\nठिय्या आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन प्रतिनिधी /रत्नागिरी मराठा आरक्षणाबद्दल शासनाने कोणताही निर्णय न झाल्याने सकल मराठा समाजाच्यावतीने गुरूवारी राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली ...Full Article\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/farmers-rasta-roko-on-nagpur-amravati-highway-mla-ashish-deshmukh-1631145/", "date_download": "2018-08-18T11:10:10Z", "digest": "sha1:SWGPF2PLPPWZ323CN5XVHGPZZQDM4WL7", "length": 12903, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "farmer rasta roko on nagpur amravati highway MLA Ashish Deshmukh | नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर | Loksatta", "raw_content": "\nबेशिस्त वाहनचालकांना ९१ लाखांचा दंड\nपक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा\nपुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित\nजळगावमध्ये महाजन-खडसे गटबाजीची सर्वत्र बाधा\nएमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल\nनुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर\nनुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर\nसरकारने पंचनामे करुन गारपीटग्रस्तांना तातडीने भरपाई द्यावी\nमंगळवारी दुपारी शेतकऱ्यांच्या रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक बराच वेळ खोळंबली होती.\nअवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी नागपूर – अमरावती मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. सरकारने पंचनामे करुन गारपीटग्रस्तांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या आंदोलनात आमदार आशीष देशमुखही सहभागी झाले होते.\nवर्धा जिल्ह्याला सोमवारी गारपिटीचा फटका बसला. मंगळवारी कारंजा (घाडगे) तालुक्यात हेटीकुंडी फाट्यावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत आक्रोश व्यक्त केला. शेतकऱ्यांनी महामार्गावर संत्रा फेकून नाराजी व्यक्त केली. कारंजा तालुक्यातील हेटीकुंडी,आगरगाव, सावली येथील शेतकऱ्यांचे गारपिटीत नुकसान झाले. गहू ,हरभरा ,बागायती टोमॅटो,वांगे, संत्रा या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. मंगळवारी दुपारी शेतकऱ्यांच्या रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक बराच वेळ खोळंबली होती. सकाळी भाजपा आमदार आशीष देशमुख यांनी नुकसान झालेल्या शेतांची पाहणी केली. संतप्त शेतकऱ्यांनी टायर जाळून सरकारचा निषेध केला.\nदरम्यान, हाताशी आलेले पीक रविवारी व सोमवारी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाने हिरावून नेल्यामुळे विदर्भातील शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. सुमारे दोन ते तीन लाख हेक्टरवरील पीक निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या हातून गेले. रब्बी हंगामातील कापणीला आलेल्या गहू, हरभरा, तूर आणि फळबागांना अधिक फटका बसला आहे. पश्चिम विदर्भातील बुलढाणा,बोंडअळीमुळे खरीप आणि गारपिटीमुळे रब्बी पीक हातचे गेल्याने शेतकरी निराधार झाला आहे. अकोला, वाशिम, अमरावती या चार जिल्ह्य़ांमध्ये पीक हानी अधिक आहे. यवतमाळ, वर्धा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्य़ात गारपिटीचे प्रमाण कमी असले तरी अवकाळी पाऊस पिकांसाठी बाधित ठरल्याने त्याची प्रत खराब होऊन दर कमी होण्याची शक्यता आहे. बोंडअळीमुळे खरीप आणि गारपिटीमुळे रब्बी पीक हातचे गेल्याने शेतकरी निराधार झाला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n पिंपरीत पित्याने दोन मुलांची हत्या करुन केली आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nIt's Official: नात्यावर शिक्कामोर्तब करत अखेर निक-प्रियांका म्हणाले....\nसहजीवनाचा पहिला टप्पा सर, थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा\nइम्रान खानच्या शपथविधीला सिद्धूंना मानाचे स्थान, घेतली लष्करप्रमुखांची गळाभेट\nमिनी एसयुव्हीसारखं डिझाईन असलेली नवीन रेनाँ क्विड वसूल करते तुमचा पै न पै\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nअंतर्गत वाहतुकीसाठी ट्रामचा पर्याय\nवाहनांना एक टोल माफ\nरेल्वेचे संगणकीय आरक्षण केंद्र पावणेतीन तास बंद राहणार\nस्वानंद देणारे शिक्षण निवडा\nवामनदादा कर्डकांना शाहिरीतून अभिवादन\nभूगावमधील हॉटेलमध्ये कोंबडय़ांच्या झुंजीवर जुगार\nपाणी पुरेना आणि म्हणे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/sports-gallery/1619832/tata-mumbai-marathon-different-photos-shades-of-marathon/", "date_download": "2018-08-18T11:10:05Z", "digest": "sha1:SDT2I7ECTOT5Q7EDHAQPT55PV74OEV4O", "length": 10156, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: tata mumbai marathon different photos shades of marathon | मुंबई मॅरेथॉनचे अनोखे रंग | Loksatta", "raw_content": "\nबेशिस्त वाहनचालकांना ९१ लाखांचा दंड\nपक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा\nपुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित\nजळगावमध्ये महाजन-खडसे गटबाजीची सर्वत्र बाधा\nएमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल\nमुंबई मॅरेथॉनचे अनोखे रंग\nमुंबई मॅरेथॉनचे अनोखे रंग\nरविवारच्या सकाळी मॅरेथॉनमध्ये नागरिकांनी धावायला सुरुवात केली आणि शालेय मुलींनी या सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी बँडच्या पथकात वादन करुन अतिशय उत्तम सलामी दिली. (छायाचित्र - प्रदिप पवार)\nआपण दिव्यांग असलो तरीही कुठेच कमी नाही, असाच संदेश या महिलेला द्यायचा असावा. देशाचा झेंडा घेऊन मॅरेथ़नमध्ये मोठ्या उत्साहाने ती सहभागी झाली होती. (छायाचित्र - प्रदिप पवार)\nतरुणांबरोबरच या मॅरेथॉनमध्ये ज्येष्ठांनीही अतिशय उत्साहात सहभाग घेतला होता. वयाची पर्वा न करता तरुणांना लाजवेल इतक्या ताकदीने ज्येष्ठ मंजळी धावत होती. (छायाचित्र - प्रदिप पवार)\nउत्तम आरोग्यासाठी धावणे आवश्यक आहे हा एकच संदेश न देता इतरही अनेक उपयुक्त संदेश या मॅरेथॉनच्या निमित्ताने देण्यात आले. देशाची लोकसंख्या वाढत असताना अनेक अडचणी वाढत असल्याने काहीनी लोकसंख्या नियंत्रणाचा संदेशही या मॅरेथॉनमध्ये दिला. (छायाचित्र - प्रदिप पवार)\nमुंबई मॅरेथॉनमध्ये केवळ मुंबईतील किंवा देशातील स्पर्धक सहभागी होतात असे नाही. तर परदेशातील नागरिकांचाही यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. चीनच्या नागरिकांचा मॅरेथॉनमधील सहभाग दर्शविताना एक चीनी नागरिक. (छायाचित्र - प्रदिप पवार)\nयेणाऱ्या पिढीनेही तंदुरुस्त असावे यासाठी आपल्या चिमुकल्याला जणू एक बाबा बाळकडूच तर देत नव्हता ना मॅरोथॉनमध्ये बाळाला कडेवर घेत या तरुणाने सहभाग घेतला. विशेष म्हणजे मॅरेथॉनचा संपूर्ण मार्ग त्याने आपल्या बाळाला कड़ेवर घेऊन पूर्ण केला. (छायाचित्र - प्रदिप पवार)\nग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाची हानी होत आहे. अशा परिस्थितीत झाडे लावा, झाडे जगवाचा संदेश देण्यासाठी या तरुणीने अतिशय अनोखी अशी वेशभूषा करुन मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. आपल्या वेशातून तिने पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचे काम केले. (छायाचित्र - प्रदिप पवार)\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nअंतर्गत वाहतुकीसाठी ट्रामचा पर्याय\nवाहनांना एक टोल माफ\nरेल्वेचे संगणकीय आरक्षण केंद्र पावणेतीन तास बंद राहणार\nस्वानंद देणारे शिक्षण निवडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/70-years-old-man-sugary-successful-by-municipal-hospital-1631004/", "date_download": "2018-08-18T11:10:00Z", "digest": "sha1:FZZQ2PUHD5Q7A4P5VB6FLFHH3AWWDOSR", "length": 12911, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "70 years old man sugary successful by municipal hospital | अबब…७० वर्षीय आजोबांच्या पोटात ८ इंचाचा गोळा | Loksatta", "raw_content": "\nबेशिस्त वाहनचालकांना ९१ लाखांचा दंड\nपक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा\nपुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित\nजळगावमध्ये महाजन-खडसे गटबाजीची सर्वत्र बाधा\nएमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल\nअबब…७० वर्षीय आजोबांच्या पोटात निघाला ८ इंचाचा गोळा\nअबब…७० वर्षीय आजोबांच्या पोटात निघाला ८ इंचाचा गोळा\nपालिका रुग्णालयातील डॉक्टरांना यश\n७० वर्षीय बबन होळकर\nमहानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नुकतीच एक अजब शस्त्रक्रिया करण्यात आली. एका ७० वर्षीय रुग्णाच्या पोटातून चक्क ८ इंचाचा आतड्याला पीळ बसून झालेला गोळा यशस्वीपणे काढण्यात आला. रुग्णाचे वय जास्त असूनही रुग्णालयातील डॉक्टरांना या शस्त्रक्रियेत यश आले आहे. या आजोबांचे नाव आहे बबन होळकर. आता त्यांची प्रकृती स्थिर असून काही दिवसातच त्यांना डिसचार्ज देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.\nहोळकर यांची अचानक तब्बेत बिघडल्याने ६ फेब्रुवारी रोजी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करताना त्यांच्या पोटात काहीतरी असल्याने शस्त्रक्रिया करावी लागेल असे डॉक्टरांनी कुटुंबियांना सांगितले. या शस्त्रक्रियेसाठी साधारण अडीच लाख रुपये खर्च होणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एवढी मोठी रक्कम आणायची कोठून असा प्रश्न असल्याने होळकर कुटुंबाने शस्त्रक्रियेस सुरुवातीला नकार दिला. त्यामुळे खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्याचा उपाय सुचवला.\nत्यानुसार बबन होळकर यांना महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तातडीने त्यांच्यावर उपचार करत शस्त्रक्रिया करण्यात आली. पालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांपुढे ही शस्त्रक्रिया करण्याचे मोठे आव्हान होते. तब्बल साडेतीन तास शस्त्रक्रिया चालली.यानंतर बबन होळकर यांच्या पोटातून चक्क ८ इंचाचा गोळा काढण्यात आला. डॉ.संजय पाडाळे, हर्षल सोनवणे,आरती फुलारी,राजेश गोरे आणि डॉ.चव्हाण या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली. यामुळे बबन होळकर या ७० वर्षीय आजोबांना जीवदान मिळाले आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या रुग्णालयाने दाखविलेल्या तत्पर्यामुळे लाखो रुपये खर्च करण्याची गरज होळकर कुटुंबाला पडली नाही. ऑगस्ट महिन्यात याच रुग्णालयात अशाच प्रकारची शस्त्रक्रिया करत महिलेच्या पोटातून १५ किलोचा गोळा काढला गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nइम्रान खानच्या शपथविधीला सिद्धूंना मानाचे स्थान, घेतली लष्करप्रमुखांची गळाभेट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसहजीवनाचा पहिला टप्पा सर, थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा\n पिंपरीत पित्याने दोन मुलांची हत्या करुन केली आत्महत्या\nIt's Official: नात्यावर शिक्कामोर्तब करत अखेर निक-प्रियांका म्हणाले....\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nअंतर्गत वाहतुकीसाठी ट्रामचा पर्याय\nवाहनांना एक टोल माफ\nरेल्वेचे संगणकीय आरक्षण केंद्र पावणेतीन तास बंद राहणार\nस्वानंद देणारे शिक्षण निवडा\nवामनदादा कर्डकांना शाहिरीतून अभिवादन\nभूगावमधील हॉटेलमध्ये कोंबडय़ांच्या झुंजीवर जुगार\nपाणी पुरेना आणि म्हणे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80.html", "date_download": "2018-08-18T11:03:12Z", "digest": "sha1:MARCOYA7TYKLEQS5GPJK7Y3E3LRJQSGH", "length": 24380, "nlines": 296, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | भारतात व्यवसाय करणे आणखी सोपे", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » भारतात व्यवसाय करणे आणखी सोपे\nभारतात व्यवसाय करणे आणखी सोपे\n१८९ देशांमध्ये १३० वे स्थान\nएकाच झटक्यात १२ देशांना मागे टाकले\nवॉशिंग्टन, [२८ ऑक्टोबर] – व्यवसायासाठी सर्वाधिक पोषक वातावरण असलेल्या १८९ देशांच्या यादीत भारताने तब्बल १२ देशांना मागे टाकून १३० वे स्थान प्राप्त केले आहे. जागतिक बँकेच्या ताज्या अहवालात ही माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अवघ्या दीड वर्षांच्या काळात जी पावले उचलली, त्याचेच हे फलित आहे.\nभारतीय अर्थव्यवस्थेचा आकार लक्षात घेता, या यादीत भारताने सरसकट १२ देशांना मागे टाकणे, ही या देशाची फार मोठी उपलब्धी आहे, असे मत जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ आणि वरिष्ठ उपाध्यक्ष कौशिक बासू यांनी म्हटले आहे.\nअर्थव्यवस्थेचा प्रचंड मोठा व्याप असलेल्या भारतासारख्या देशाने व्यवसायासाठी पोषक वातावरण असणार्‍या देशांच्या यादीत अल्पावधीतच स्वत:च्या कामगिरीत इतकी सुधारण करावी, ही लहान गोष्ट नाही. भारत आतापर्यंत या यादीत १४२ व्या क्रमांकावर होता. आता तो १३० व्या क्रमांकावर आहे. भारत सरकारने जे काही केले, ते जगभरातील गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक संकेतच आहेत. सध्या भारताची ज्या दिशेने वाटचाल सुरू आहे, ती जगाला योग्य संकेत देणारीच आहे, असे बासू यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. जागतिक बँकेने ‘डुईंग बिझिनेस २०१६’ हा आपला अहवाल प्रकाशित केला आहे. याच अनुषंगाने बासू बोलत होते.\nया अहवालात सिंगापूर आघाडीवर असून, त्यापाठोपाठ न्यूझीलंड, डेन्मार्क, दक्षिण कोरिया, हॉंगकॉंग, ब्रिटन आणि अमेरिकेचाही पहिल्या दहामध्ये समावेश आहे. भारताने गेल्या वर्षभरात आर्थिक आघाडीवर दोन महत्त्वाच्या सुधारणा राबविल्यामुळेच १२ देशांना मागे टाकणे भारताला शक्य झाले, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nआणखी सुधारणा करू : जेटली\nदरम्यान, जागतिक बँकेच्या अहवालावर समाधान व्यक्त करताना, भारतात व्यवसायाची स्थिती सुधारण्यासाठी आणखी आवश्यक सुधारणा करण्यात येणार असल्याची ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. व्यवसायासाठी पोषक वातावरण असलेले ठिकाण म्हणून भारताचा विकास होत आहे, हे जागतिक बँकेने मान्य केले, यातच बरेच काही आले. या यादीत सध्या आम्ही १३० व्या स्थानावर असलो, तरी पंतप्रधान मोदी यांनी जगभरातील गुंतवणूकदारांच्या मनात जो विश्‍वास निर्माण केला आहे, त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. अनेक देशांनी भारतात गुंतवणुकीसाठी पुढाकार घेतला आहे, असे जेटली यांनी स्पष्ट केले.\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nतीन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्राचे नोबेल\nबांगलादेशात तीन लाख रोहिंग्यांनी आश्रय घेतला : युनो\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1263 of 2458 articles)\nहोय, काश्मिरात आम्हीच पाठविले अतिरेकी\nतोयबाच्या निर्मितीमागे पाक, लादेन आमचा हिरो परवेज मुशर्रफ यांची जाहीर कबुली इस्लामाबाद, [२७ ऑक्टोबर] - अल कायदाचा म्होरक्या ओसामा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-marathi-news-maharashtra-news-goregaon-suicide-student-suicide-51115", "date_download": "2018-08-18T10:39:30Z", "digest": "sha1:G5S4TN4JYTV65MXGZN42E62JZS6P4GKM", "length": 11542, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news marathi news maharashtra news goregaon suicide student suicide मुंबईतील गोरेगावात विद्यार्थ्याची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nमुंबईतील गोरेगावात विद्यार्थ्याची आत्महत्या\nबुधवार, 7 जून 2017\nमुंबई : अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात नापास झाल्याने वीस वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज (बुधवार) गोरेगाव येथील एका इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून कबीर मानसिंग चमेलिया (वय 20) या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nमुंबई : अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात नापास झाल्याने वीस वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज (बुधवार) गोरेगाव येथील एका इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून कबीर मानसिंग चमेलिया (वय 20) या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -\nशिवसेना आक्रमक; मंत्रीमंडळ बैठकीवर बहिष्कार\nकर्जमाफीसाठी समितीत शिवसेनाही असेल: मुनगंटीवार\nशेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे: सुभाष देसाई\nसंप मिटवायचा आहे की नाही\nपाकिस्तान होणार चीनचा लष्करी तळ; 'पेंटॅगॉन'चा अहवाल​\nहिज्बुलचा दहशतवादी दानिश अहमदचे आत्मसमर्पण\n'यूपीआय' व्यवहारांवर भरावे लागणार शुल्क\nशेतकऱ्यांकडून मंदसोरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मारहाण​\nलातूर: मुसळधार पावसामुळे पूल गेला वाहून\nअकोला, बुलडाणा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी\n जाळपोळ करणारे शिवसेनेवाले समजायचे का\nनागालँड: चकमकीत जवान हुतात्मा, 3 दहशतवादी ठार​\nलंडनवासीयांनी लुटला सांस्कृतिक कार्यक्रमांचा 'आस्वाद'​\nमेट्रोच्या खांबाचा सांगाडा 'बेस्ट'वर कोसळला\nमालाड - कांदिवली येथे पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरील मेट्रोच्या खांबाचा लोखंडी सांगाडा गुरुवारी...\n‘गुगल’कडून सव्वा कोटी पॅकेज\nगोरेगाव - ‘गुगल इनकॉर्पोरेशन’तर्फे मुंबईकर विद्यार्थी आदित्य पालीवाल याला तब्बल एक कोटी २० लाखांची नोकरी मिळाली आहे. १६ जुलैपासून तो कामावर रुजू झाला...\nउच्चशिक्षित शेतकरी हरीणखेडे यांनी केली ऊस पिकाची शेती\nगोरेगाव - तालुक्यातील कटंगी बुजरुक येथील उच्च शिक्षित शेतकरी फनेद्र नत्थु हरीणखेडे यांनी पारंपरिक भात शेतीबरोबर ३ एकर शेतजमिनीत २६५, २३८ या ऊस...\nगणपतीसाठी ढोल-ताशा-ध्वज पथक सज्ज...\nपाली (रायगड) : लहानग्यांसह तरुणाईमध्ये ढोल-ताशा या पारंपारीक वादनाची मोठी क्रेझ पहायला मिळत आहे. गणपती जवळ अाल्याने तर जिल्ह्यातील ढोलताशा पथक...\nतरुणांना शेतीची ओढ..अनेकांनी निवडले करियर म्हणून\nपाली - एकविसाव्या शतकातील तरुणाई विविध क्षेत्रात आपले करियर करत आहेत. मात्र अजुनही काही तरुणांनी आपल्या मातीशी प्रेम व नाते घट्ट धरुन ठेवले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/sakal-editorial-dhing-tang-british-nandi-47951", "date_download": "2018-08-18T10:35:23Z", "digest": "sha1:AIB6USXAAW6M6EEIC5DGFFZE27JJDFHQ", "length": 12208, "nlines": 222, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sakal Editorial Dhing Tang British Nandi अच्छी और बुरी खबर! (ढिंग टांग) | eSakal", "raw_content": "\nअच्छी और बुरी खबर\nशुक्रवार, 26 मे 2017\n\"खाविंद, एक बुरी खबर आहे,\nआणि दुसरी अच्छी...परवानगी असेल,\nतर सुनावतो...,'' असे म्हणत\nपुढ्यातील अंगूरांचा खात्मा करत\nखाविंद म्हणाले, \"\"अच्छी खबर\nआधी सुनव. क्‍यों की बुरी खबर\nसुनाने के बाद तुझी जुबां\n\"खाविंद, एक बुरी खबर आहे,\nआणि दुसरी अच्छी...परवानगी असेल,\nतर सुनावतो...,'' असे म्हणत\nपुढ्यातील अंगूरांचा खात्मा करत\nखाविंद म्हणाले, \"\"अच्छी खबर\nआधी सुनव. क्‍यों की बुरी खबर\nसुनाने के बाद तुझी जुबां\nमजनू खान म्हणाला, \"\"सूरज आणि चांद\nज्यांच्या आज्ञेबाहेर उगवू किंवा मावळू\nशकत नाहीत, अशा शहंशाह ह्यांच्या\nहमला चढवला. महलच्या बाहेरील\nआपल्या चौक्‍या उद्‌ध्वस्त करून\nदरोदराज फोडून काढत त्यांनी\nटोप, कढया, डेगची सारे काही\nउलथे पालथे करून चूल्ह्यामधली\nजागेवर टिकू दिली नाही, खाविंद\nतोंप आणि बरच्यांची बारीश करून\nदुश्‍मनांनी आपले सैन्य तहस नहस केले,\nलेकिन हमनें भी दिलेरी दिखाते,\nत्यांना चोख जबाब दिला, आणि\nबमबारीची एक रंगीन खौफनाक\nतसबीर बनवून त्यांना दाखवली,\nम्हटले, खामोश रहो, नहीं तो ऐसी\nहालत करेंगे की तुम्हारी\nसोन्याच्या परडीतील आणखी एक\nसेब उचलत खाविंद म्हणाले,\n\"\"शाब्बाश, अब बुरी खबर सुनाओ\nआपला मुदपाकखाना नष्ट झाला आहे.\nसबब, आज खाविंदांना खान्यामध्ये\nगोश्‍त के जगह गोभी खानी पडेगी\nखाविंदांनी सेब फेकून देत\nदेण्यापूर्वी तुझे दात का नाही पडले\nजुबां नहीं, मुंडी काट दो\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nपुन्हा माझा बळी देऊ नका - सतेज पाटील\nकोल्हापूर - ‘माझ्यासह कार्यकर्त्यांच्या गाफीलपणामुळे मागील निवडणुकीत माझा बळी गेला. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा माझा बळी देऊ नका’, अशा इशारा...\nस्वतंत्रता दिवसाच्या कार्यक्रमासाठी राजधानीतील लाल किल्ल्यासमोर जमा झालेल्या मान्यवरांच्या रांगेत आम्हीदेखील होतो. रांगारांगातून पडलेले कागद...\nगोवा : धावत्या वाहनाने घेतला अचानक पेट\nगोवा : दक्षिण गोव्यातील झुआरी पुलाजवळ एका वाहनाने अचानक पेट घेतला. या दुर्घटनेत वाहन चालकांना प्रसंगवधान ओळखून वाहन रस्त्याच्या बाजूला थांबवून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/job-opportunities-88-1626011/", "date_download": "2018-08-18T11:12:40Z", "digest": "sha1:22PSCMFANHSHC3YYAHTGUR3PZJAT7RIY", "length": 14552, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "job opportunities | नोकरीची संधी | Loksatta", "raw_content": "\nबेशिस्त वाहनचालकांना ९१ लाखांचा दंड\nपक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा\nपुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित\nजळगावमध्ये महाजन-खडसे गटबाजीची सर्वत्र बाधा\nएमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल\nओसीईएस टीएसओज आणि डीजीएफएस फेलोज यांना दरमहा रु. ३५,०००/- स्टायपेंड दिले जाईल.\nडीएईमध्ये सायंटिफिक ऑफिसर पदांची भरती.\nभारत सरकार, डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी (डीएई)मध्ये भाभा अ‍ॅटॉमिक रिसर्च सेंटर ट्रेनिंग स्कूल्समार्फत वर्ष २०१८-१९ साठी इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्स आणि सायन्स पोस्ट ग्रॅज्युएट्सची ‘सायंटिफिक ऑफिसर’ पदांची भरती (OCES/DGFS- 2018)\nपात्रता – मेकॅनिकल, केमिकल, मेटॅलर्जिकल, मटेरियल्स, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रमेंटेशन, कॉम्प्युटर, न्यूक्लियर इंजिनीअरिंगमधील बीई किंवा बीटेक.\nसायन्स स्ट्रीमसाठी पात्रता – फिजिक्स, अ‍ॅप्लाईड फिजिक्स, केमिस्ट्री, बायोसायन्सेस, जीओफिजिक्स, अ‍ॅप्लाईड जीओफिजिक्स, जीऑलॉजी, अ‍ॅप्लाईड जीऑलॉजीमधील एमएस्सी किंवा बीएस्सी (टेक) (फूड टेक्नॉलॉजी) पात्रता परीक्षेत किमान ६०% गुण आवश्यक.\nट्रेनिंग स्कीम्स – ओरिएंटेशन कोर्स फॉर इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्स अ‍ॅण्ड सायन्स पोस्ट ग्रॅज्युएट्स (ओसीईएस)\nकालावधी – एक वर्ष.\nट्रेनी सायंटिफिक ऑफिसर (टीएसओ) जे किमान ५०% गुणांसह ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण करतील त्यांना डीएईअंतर्गत कार्य करणाऱ्या १२ युनिट्समध्ये सायंटिफिक ऑफिसर (ग्रुप- ए) म्हणून नेमले जाईल. ट्रेनिंगदरम्यान किमान पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना एमटेक/ एमफिल कोर्ससाठी होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट (एचबीएनआय) (जी एक डिम्ड युनिव्हर्सटिी आहे.) प्रवेश दिला जाईल. उत्कृष्ट कामगिरी असणारे उमेदवार पीएचडीसाठी एचबीएनआयमध्ये प्रवेश घेऊ शकतात.\nदोन वर्षांसाठी डीएई ग्रॅज्युएट फेलोशिप स्कीम – इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्स आणि फिजिक्स पोस्ट ग्रॅज्युएट्स जे बीएआरसी ट्रेनिंग स्कूलच्या मुलाखतीत चांगली कामगिरी करणारे आणि आयआयटी/ एनआयटीत एमटेक/ एमकेम इंजिनीअरिंगला प्रवेश घेतलेले यांच्यासाठी. ओसीईएस टीएसओज आणि डीजीएफएस फेलोज यांना दरमहा रु. ३५,०००/- स्टायपेंड दिले जाईल.\nट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ‘सायंटिफिक ऑफिसर सी’ या पदावर लेव्हल- १० – रु. ५६,१००/- (सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पे मॅट्रिक्स) सुरुवातीचे वेतन दरमहा रु. ८४,०००/- इतर भत्ते.\nनिवड पद्धती – ओसीईएससाठी ऑनलाइन एक्झामिनेशन घेतली जाईल. ही मार्च/एप्रिल २०१८ मध्ये इंजिनीअरिंगच्या ९ डिसिप्लीनसाठी आणि सायन्सच्या ५ डिसिप्लीनसाठी घेतली जाईल. यातील गुणवत्तेनुसार आणि जीएटीई स्कोअर (गेट २०१७ किंवा गेट २०१८) वरून उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड मुलाखतीसाठी केली जाईल.\nमुलाखतीतील कामगिरीवर आधारित अंतिम निवड. मुलाखत मुंबई (सर्व डिसिप्लीनसाठी) आणि हैदराबाद (फक्त जीऑलॉजी आणि अप्लाईड जीऑलॉजीसाठी) होईल.\nअर्जाचे शुल्क – रु. ५००/-. फक्त जनरल आणि इमावच्या पुरुष उमेदवारांसाठी.\n(महिला, अजा/अज यांना फी माफ आहे.)\nऑनलाइन अर्ज http://www.barconlineexam.in या संकेतस्थळावर दि. ४ फेब्रुवारी २०१८ पर्यंत करावेत. गेट- २०१८ स्कोअर अपलोड करण्याची अंतिम तारीख २ एप्रिल २०१८.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n पिंपरीत पित्याने दोन मुलांची हत्या करुन केली आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nIt's Official: नात्यावर शिक्कामोर्तब करत अखेर निक-प्रियांका म्हणाले....\nसहजीवनाचा पहिला टप्पा सर, थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा\nइम्रान खानच्या शपथविधीला सिद्धूंना मानाचे स्थान, घेतली लष्करप्रमुखांची गळाभेट\nमिनी एसयुव्हीसारखं डिझाईन असलेली नवीन रेनाँ क्विड वसूल करते तुमचा पै न पै\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nअंतर्गत वाहतुकीसाठी ट्रामचा पर्याय\nवाहनांना एक टोल माफ\nरेल्वेचे संगणकीय आरक्षण केंद्र पावणेतीन तास बंद राहणार\nस्वानंद देणारे शिक्षण निवडा\nवामनदादा कर्डकांना शाहिरीतून अभिवादन\nभूगावमधील हॉटेलमध्ये कोंबडय़ांच्या झुंजीवर जुगार\nपाणी पुरेना आणि म्हणे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kolhapur-news/p-chidambaram-attend-dy-patil-university-convocation-ceremony-1619566/", "date_download": "2018-08-18T11:12:45Z", "digest": "sha1:QVLIPSHWLFWAKJULPSBMQLG7F7E57HE6", "length": 14207, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "P Chidambaram attend DY Patil University Convocation ceremony | प्रचंड लोकसंख्येला आरोग्य सुविधा देण्यात कमी पडल्यास गंभीर संकट | Loksatta", "raw_content": "\nबेशिस्त वाहनचालकांना ९१ लाखांचा दंड\nपक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा\nपुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित\nजळगावमध्ये महाजन-खडसे गटबाजीची सर्वत्र बाधा\nएमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल\nप्रचंड लोकसंख्येला आरोग्य सुविधा देण्यात कमी पडल्यास गंभीर संकट\nप्रचंड लोकसंख्येला आरोग्य सुविधा देण्यात कमी पडल्यास गंभीर संकट\nकसलेही राजकीय विधान न करता पी. चिदंबरम यांनी देशातील मूलभूत सुविधांवर भाष्य केले .\nडी. वाय. पाटील विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी कुलपती डॉ . विजय भटकर यांच्या हस्ते श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना डि.लिट. उपाधी देऊन सन्मानित करण्यात आले. (छाया - राज मकानदार)\nपी. चिदंबरम यांचा इशारा\nराज्य आणि केंद्र सरकारच्या बालकांच्या आरोग्य बांधीलकीबद्दल संशय घेण्यास वाव आहे. कुटुंब कल्याण, महिला व बालविकास यांच्या निधीवाटपात सातत्याने कपात होत आहे. प्रचंड लोकसंख्येला आरोग्य देण्यात कमी पडल्यास आपणास गंभीर संकटाना तोंड द्यावे लागेल , असा इशारा माजी केंद्रीय माजी केंद्रीय गृह, वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी शनिवारी येथे दिला.\nयेथील डी. वाय. पाटील विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ डी.वाय.पाटील हॉस्पिटलच्या प्रांगणात आज उत्साहात पार पडला. या दीक्षान्त समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पी. चिदंबरम मार्गदर्शन करताना बोलत होते . अध्यक्षस्थानी कुलपती डॉ. विजय भटकर होते. त्यांच्या हस्ते या वेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना डि.लीट. पदवीने, तर नवी दिल्ली येथील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजचे माजी अधिष्ठाता डॉ. अरुण कुमार अगरवाल यांना डीएस्सी पदवीने सन्मानित करण्यात आले. या वेळी २३० स्नातकांना पदवी देऊन गौरविण्यात आले.\nकसलेही राजकीय विधान न करता पी. चिदंबरम यांनी देशातील मूलभूत सुविधांवर भाष्य केले . ते म्हणाले, भारतासारख्या विस्तृत देशात सर्वाना पायाभूत शिक्षण देण्याबरोबरच सर्व क्षेत्रात गुणवत्तापूर्ण डॉक्टर, इंजिनिअर आणि कुशल तंत्रज्ञ निर्माण करण्याबरोबरच आरोग्य क्षेत्राची प्रगती करतांना १२ वयोगटाखालील मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त झाले आहे. संसदेकडून अन्न सुरक्षा कायदा लागू करण्यात आला. मात्र या कायद्यानुसार दिलेल्या अभिवचनाची पूर्तता होत नसल्याने राज्य व केंद्र सरकारच्या आरोग्य बांधीलकीबद्दल संशय घेण्यास वाव आहे.\nवैद्यकीय सेवा ही केवळ व्यवसाय नसून खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयात सेवा बजावण्याचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. त्यामुळे उदयोन्मुख डॉक्टरांनी समाजासाठी रुग्णांना मदत करण्याची भावना मनात ठेवून रुग्णसेवा करावी , असे आवाहन त्यांनी केले .\nया वेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले,की मला डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून डिलीट मिळतेय ही अभिमानाची बाब आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. आंबेडकर यांनी बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले. हा वारसा जपण्याचे काम केले जात आहे .\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n पिंपरीत पित्याने दोन मुलांची हत्या करुन केली आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nIt's Official: नात्यावर शिक्कामोर्तब करत अखेर निक-प्रियांका म्हणाले....\nसहजीवनाचा पहिला टप्पा सर, थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा\nइम्रान खानच्या शपथविधीला सिद्धूंना मानाचे स्थान, घेतली लष्करप्रमुखांची गळाभेट\nमिनी एसयुव्हीसारखं डिझाईन असलेली नवीन रेनाँ क्विड वसूल करते तुमचा पै न पै\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nअंतर्गत वाहतुकीसाठी ट्रामचा पर्याय\nवाहनांना एक टोल माफ\nरेल्वेचे संगणकीय आरक्षण केंद्र पावणेतीन तास बंद राहणार\nस्वानंद देणारे शिक्षण निवडा\nवामनदादा कर्डकांना शाहिरीतून अभिवादन\nभूगावमधील हॉटेलमध्ये कोंबडय़ांच्या झुंजीवर जुगार\nपाणी पुरेना आणि म्हणे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://diamondbookspune.com/viewdetails.php?bid=811&cat=%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2018-08-18T09:58:25Z", "digest": "sha1:KHFAUPGIUMRV72UYUNKHOOTFEGCKTYCV", "length": 4943, "nlines": 72, "source_domain": "diamondbookspune.com", "title": "Welcome to Diamond Publications", "raw_content": "\nशारीरिक शिक्षण व खेळ\nBook Name : शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा\nAuthor : सर आर्थर कॉनन डॉयल अनु: दिलीप चावरे\nसुरुवातीला तिला कसलीही जखम दिसली नाही; पण तिनं त्याला उठवायचा प्रयत्न करताच तिला त्याच्या मानेच्या खालच्या बाजूला वाहत असलेलं रक्त दिसलं. त्याला छोटीशीच, पण खूप खोल जखम झाली होती. तिने त्याच्या तोंडावर पाणी शिंपडल्यावर त्याने क्षणभरा डोळे उघडले.‘प्राध्यापक -ती होती’, तो पुटपुटला. त्यानं आणखी काहीतरी बोलण्याचा अतोनात प्रयत्न केला; पण त्यानंतर तो लगेचच मरण पावला. शेरलॉक होम्सच्या कथांमधून वाढत जाणारी रहस्यामायाता वाचकाची उत्सुकता शिगेला पोहोचवते. वरकरणी थेट वाटणार्‍या खुनांची अजब गुंतागुंत सर आर्थर कॉनन डॉयल शेरलॉक होम्सच्या माध्यमातून अधिक जिवंत आणि रोमांचक करतात आणि वाचकाला अक्षरश: खिळवून ठेवतात\nसमाजशास्त्र ललित अर्थशास्त्र वाणिज्य-व्यवस्थापनशास्त्र\nइतिहास व्यक्तिमत्त्व विकास चरित्रे-आत्मचरित्रे पत्रकारिता-प्रसारमाध्यमे\nराज्यशास्त्र कविता संग्रह भूगोल धार्मिक\nमानसशास्त्र मराठी साहित्य पर्यावरण ग्रंथालय-माहितीशास्त्र\nस्पर्धा परीक्षा बाल-कुमार वाङमय आपत्ती व्यवस्थापन संगीत\nआरोग्य क्रमिक पुस्तके नाटकं आयुर्वेद\nअनुवादित पुस्तके बेस्टसेलर्स विज्ञानविषयक ज्योतिष\nकथा कोशवाङमय शिक्षणशास्त्र English Literature\nकादंबरी स्त्रीविषयक शारीरिक शिक्षण व खेळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/konkan-news-goas-culture-will-not-come-sindhudurga-54479", "date_download": "2018-08-18T10:49:05Z", "digest": "sha1:REAUT4NAF2KMNJUXKF3GPZPTBHP24DGM", "length": 18155, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "konkan news goa's culture will not come in Sindhudurga? गोव्याची सॅक संस्कृती सिंधुदुर्गात येणार नाही ना? | eSakal", "raw_content": "\nगोव्याची सॅक संस्कृती सिंधुदुर्गात येणार नाही ना\nगुरुवार, 22 जून 2017\nगोव्यातील बहुसंख्य तारांकित हॉटेल किनाऱ्यापासून दूर आहेत. त्या ठिकाणी मिळणाऱ्या वस्तूंच्या दराच्या तुलनेत सॅकमध्ये स्वस्ताई आहे. असे असलेतरी बऱ्याचशा सॅक परदेशी पर्यटकांचा अमली पदार्थांचा अड्डा बनल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबवत्सल पर्यटकांना त्याचा फायदा होताना दिसत नाही.\nगोव्यातील बहुसंख्य तारांकित हॉटेल किनाऱ्यापासून दूर आहेत. त्या ठिकाणी मिळणाऱ्या वस्तूंच्या दराच्या तुलनेत सॅकमध्ये स्वस्ताई आहे. असे असलेतरी बऱ्याचशा सॅक परदेशी पर्यटकांचा अमली पदार्थांचा अड्डा बनल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबवत्सल पर्यटकांना त्याचा फायदा होताना दिसत नाही.\nसावंतवाडी - सिंधुदुर्गासह कोकणात बीच सॅक संस्कृती आणण्याचा निर्णय राज्याच्या पर्यटन मंत्रालयाने घेतला आहे. गोव्याच्या धर्तीवरील या नव्या संस्कृतीतून थेट किनारा पर्यटनासाठी खुला होणार आहे. यातून पर्यटन वाढीला चालना मिळणार असली तरी यानिमित्ताने गोव्यासारखी सॅक संस्कृती येथे येणार नाही ना याची दक्षता घ्यावी लागणार आहे.\nसिंधुदुर्गासह कोकणच्या पर्यटन विकासासाठी किनाऱ्यावर सॅक, हटस्‌, अंब्रेला उभारण्याचा निर्णय झाला आहे. मुंबईत पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गोव्याच्या धर्तीवर हा नवा निर्णय जारी झाला. यात तारकर्ली, आरवली, शिरोडा या किनाऱ्यांवर प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविला जाणार आहे. यातील शिरोडा व आरवली हे दोन्ही किनारे गोव्याच्या सीमेवर आहेत. या निर्णयामुळे किनाऱ्यापासून कमी अंतरावर पर्यटकांना सुविधा उपलब्ध होतील. त्याला सीआरझेडचा अडथळा येणार नाही. यातून किनाऱ्यावरील पर्यटनाला नवी ओळख मिळणार आहे. असे असलेतरी गोव्याच्या सॅक संस्कृतीचे ड्युप्लीकेशन झाल्यास कोकणातील सुसंस्कृत पर्यटन अडचणीत येण्याची भीती आहे.\nगोव्यात गेली दहा वर्षे सॅक टुरिझम सुरू आहे. सीआरझेडमुळे किनाऱ्यापासून जवळ कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येत नाही. साहजिकच हॉटेल्स व पर्यटनासाठी इतर सुविधा थेट किनाऱ्यावर उभारायला मर्यादा होत्या. २००१ मध्ये सीआरझेडमध्ये बदल केला. त्यात पर्यटनासाठी किनाऱ्यापासून दीडशे ते दोनशे मीटर या ना विकास क्षेत्रात (नो डेव्हलपमेंट झोन) तात्पुरत्या स्वरुपातील व्यावसायिक कारणासाठी झोपड्या उभारण्यास परवानगी दिली. तेव्हापासून गोव्याच्या किनाऱ्यावर अशा झोपड्या उभारल्या जाऊ लागल्या. २००३ मध्ये गोव्याच्या पर्यटन विभागाने याला अधिकृत मान्यता दिली.\nसॅकसाठी वेगळे धोरण ठरविले. यात लॉटरी पद्धतीने आणि स्थानिकांना प्राधान्य देऊन सॅक बांधण्यास परवानगी देण्यात येऊ लागली आहे. एका व्यक्तीला तीन वर्षांसाठी ही परवानगी दिली जाते. यानंतर त्याचा परवाना रद्द होतो.\n१ ऑक्‍टोबर ते ३१ मे या काळात ही सॅक व्यावसायिक वापरासाठी चालविली जाते. पावसाळ्यात मात्र ती चालवता येत नाही. सांडपाणी, मलमुत्र विसर्जन यासाठी व्यवस्था करावी लागते. या सॅकमध्ये दारू विक्रीसाठीही तात्पुरते परवाने दिले जातात.\nसुरवातीच्या काळात स्थानिकांनी या सॅक चालविल्या. नंतर मात्र स्थानिकांच्या नावावर परवाने घेऊन परदेशी व्यक्ती या सॅक चालवू लागल्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. हळूहळू हे सॅक म्हणजे अमली पदार्थांचा अड्डा बनत गेला. गेल्या पाच-सहा वर्षात गोव्यात दोन परदेशी तरुणींचा खून झाला. या दोन्ही घटना सॅक संस्कृतीशी निगडीत होत्या. यामुळे या सॅककडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला.\nगोव्यातील बहुसंख्य तारांकीत हॉटेल किनाऱ्यापासून दूर आहेत. त्या ठिकाणी मिळणाऱ्या वस्तूंच्या दराच्या तुलनेत सॅकमध्ये स्वस्ताई आहे. असे असलेतरी बऱ्याचश्‍या सॅक परदेशी पर्यटकांचा अमली पदार्थांचा अड्डा बनल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबवत्सल पर्यटकांना त्याचा फायदा होताना दिसत नाही. कोकणातही १ सप्टेंबर ते ३१ मे या काळासाठी सॅक ला परवानगी दिली जाणार आहे. सॅकचे परवाने देतांना त्याचा स्थानिकांना फायदा लक्षात घ्यायला हवा. यातून पर्यटकांची लूट होणार नाही असेही धोरण ठरवायला हवे. हा खरेतर स्वागतार्ह निर्णय आहे; मात्र त्याची अमलबजावणी ‘एमटीडीसीच्या’ टिपीकल सरकारी पद्धतीने झाली तर त्याचा फारसा फायदा होताना कठीण आहे. या बरोबरच कोकणच्या सॅक संस्कृतीची सुसंस्कृत ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीनेही धोरण ठरविले जाणे आवश्‍यक आहे.\nMaratha Kranti Morcha : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री आंदोलन\nपुणे : मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे सोमवारपासून (ता.20) मराठा आरक्षणासाठी आणि विविध मागण्यांसाठी पुणे विभागीय आयुक्त...\n'एक धागा शौर्य' का सैनिकांसाठी जुन्नरच्या विद्यार्थ्यांनीचा अभिनव उपक्रम\nजुन्नर - सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांसाठी जुन्नरच्या शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थिनींनी 'एक धागा शौर्य'का हा अभिनव...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nबारामती - विद्या प्रतिष्ठानच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पुरस्कार\nबारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://krupasindhumasik.blogspot.com/2012/05/blog-post_08.html", "date_download": "2018-08-18T10:06:32Z", "digest": "sha1:Q6HQC4M4SKNSQROJXOUPV465YEAZIE2M", "length": 6364, "nlines": 85, "source_domain": "krupasindhumasik.blogspot.com", "title": "KRUPASINDHU MASIK: अनुभव कथन : - दीपावीरा कोरन्ने", "raw_content": "\nअनुभव इथे पोस्ट करु शकता...\nकविता इथे पोस्ट करु शकता...\nअनुभव कथन : - दीपावीरा कोरन्ने\n- दीपावीरा कोरन्ने. पृष्ठ - ५\nसद्‌गुरू बापूंच्या छत्रछायेत राहणार्‍या भक्तांना कधीकधी असे अनुभव येतात की त्यांची व्याप्ती त्यांच्यापेक्षा इतरांना जास्त कळलेली असते. एका जोरदार धक्क्याने तोल जाऊन ओबडधोबड जमीनीवर पडणार्‍या एका श्रध्दावान बापूभक्ताला साधे खरचटत सुध्दा नाही आणि एवढेच नाही तर पडताना ती व्यक्ती, स्वतःच्या शरीराला इजा होणार नाही अश्या पध्दतीने, स्वतःच्या नकळत कशी पडली ह्याचं वर्णन जेव्हा इतर बघणार्‍या व्यक्तींकडून ऎकायला मिळतं, तेव्हा तर त्या श्रध्दावानावर तोंडात बोटं घालण्याचीच वेळ येते.\nआजच आपले कृपासिंधु मासिक राखून ठेवा. सर्व स्टॉलवअर उपलब्ध.\nअधिक माहिती साठी :\nसंपर्क : २६०५४४७४/ २६०५७०५४/ २६०५७०५६\nनोंदणी फॉर्मसाठी इथे क्लिक करा...\nमे २०१२ महिन्याच्या अंकाची अनुक्रमणिका\nसंपादकीय- अजित पाध्ये (२)\nबापू तूच तारणहार - भूषण नाईक, पुणे\t(३)\nबापू माझा तारणहार - दीपावीरा कोरान्ने (५)\nइतुके अनंत प्रेम फक्त त्याचे\t- डॉ. केशवसिंह नर्सीकर, वाशी (८)\nशरणागत वत्सलम्‌ श्री अनिरुद्धम्‌\t- गौरी पेंडसे, दोहा (कतार) (११)\nदेई निरंतर, चरणसेवा...\t- हेमावीरा अष्टपुत्रे (१३)\nज्याच्या शिरी बापूंचा हात, त्याची कलिकाळावरही मात\t- कुसुम दरेकर, नाशिक (१७)\nनकळत सारे घडले\t- माधवी टिळवे (२०)\nअंजनामाता वहीचा अनुभव\t- मनिषावीरा कारखानीस (२३)\nचरमकृपालु बापू अनुरागी\t- रंजना नायक, मेलबॉर्न, ऑस्ट्रेलिया (२५)\nश्रीकंठकूपपाषाण पूजन - एक अभूतपूर्व अनुभव\t- रविंद्रसिंह बदियानी, गिरगाव\t(२९)\nश्रीगुरुक्षेत्रम्‌ मंत्राने बाधा दूर झाली\t- सुदेश घरत, पालघर (३१)\n\t- उर्मिल म्हात्रे (३३)\nक्लेशनिवारक श्रीअनिरुद्ध कवच (भाग - २)\t- डॉ. योगिंद्रसिंह जोशी\t(३७)\nफिटे अंधाराचे जाळे\t- संजिवसिंह सुळे, वडगांव (४१)\nकृपासिंधु तू, तू अनिरुद्ध (भाग - ५)\t- सदानंदसिंह वर्तक (४७)\nसंताघरची उलटीच खूण\t- प्रशांतसिंह गडकरी (५३)\nअनुभव कथन : - डॉ. केशवसिंह नर्सीकर, वाशी\nअनुभव कथन : - दीपावीरा कोरन्ने\nअनुभव कथन : भूषणसिंह नाईक, पुणे\nमे २०१२ अंकाचे संपादकिय\nकृपासिंधु मे २०१२ महिन्याच्या अंकाची अनुक्रमणिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/", "date_download": "2018-08-18T10:30:38Z", "digest": "sha1:ITN2Y72ZDONK5YICK6BNSIR2VGVOORY3", "length": 17057, "nlines": 315, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Nashik news| Latest News in Marathi | Nashik | North Maharashtra | Khandesh |Jalgaon | Ahamadnagar", "raw_content": "\nजळगाव मनपा निवडणूक निकाल\nदेशदूत कृषी सप्ताह (१ जुलै ते ७ जुलै २०१८)\nदेशदूत तेजस पुरस्कार २०१८\nजळगाव मनपा निवडणूक निकाल\nजळगावात मनपात भाजपाची कसोटी\nजळगावला सीमा भोळे महापौरपदाच्या दावेदार\nमनपा कर्जमुक्त करुन दाखवावी\nजनतेला दिलेला शब्द पाळणार – ना. गिरीश महाजन\nसुरेशदादांच्या वर्चस्वाला सुरुंग : ‘कमळ’ फुलले\nदेशदूत कृषी सप्ताह (१ जुलै ते ७ जुलै २०१८)\nदेशदूत तेजस पुरस्कार २०१८\nकेरळमधील पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्राकडून 20 कोटींचे अर्थसहाय्य\nघोटीत भंडारदरा चौकाला अटलबिहारी चौक असे नामकरण\nदेशात मुलींचा जन्मदर वाढला; बेटी बचाव योजनेची फलनिष्पत्ती\nकेरळ पूरग्रस्तांसाठी पेटीएमची ‘निधीसंकलन’द्वारे मदत\nअखेर प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचा साखरपुडा; पाहा छायाचित्रे\nकेरळमधील पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्राकडून 20 कोटींचे अर्थसहाय्य\nघोटीत भंडारदरा चौकाला अटलबिहारी चौक असे नामकरण\nघोटीत भंडारदरा चौकाला अटलबिहारी चौक असे नामकरण\nअमळनेर तालुक्यातील मांडळ येथे एस टी बस जळुन खाक\nदेशात मुलींचा जन्मदर वाढला; बेटी बचाव योजनेची फलनिष्पत्ती\nवणी-बोरगाव-सापुतारा रस्त्याची दयनीय अवस्था\nगंगापूर धरण समूहातील चारही धरणांची नव्वदी पार\n१८ ऑगस्ट २०१८ , ई-पेपर , नाशिक\nभारत अन सागर यांची जुगलबंदी असलेला ‘झांगडगुत्ता’ लवकरच\nअखेर प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचा साखरपुडा; पाहा छायाचित्रे\nViral Video : गटारीत हात घालताच सापडले जिवंत बाळ\nसोनी मराठी चॅनल आजपासून सुरु\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : गोदावरीला पुन्हा पूर; दूतोंड्या मारुतीच्या पायाशी पाणी\nएन.टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये झळकणार सचिन खेडेकर\nकेरळमधील पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्राकडून 20 कोटींचे अर्थसहाय्य\nमुंबई : केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या संकटप्रसंगी पूरग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्रातर्फे 20 कोटी रुपयांची तातडीची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. तसेच...\nअमळनेर तालुक्यातील मांडळ येथे एस टी बस जळुन खाक\nपाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणार्‍या गाळणखुर्दच्या सीआरएफ जवान प्रविण पाटील यांना राष्ट्रपती...\nराज्यातही जोर ‘धार’; अनेक गावांचा संपर्क तुटला\nViral Video : गटारीत हात घालताच सापडले जिवंत बाळ\nभारत -इंग्लंड ३ री कसोटी ; इंग्लंडचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय\nआजपासून १८व्या आशियाई स्पर्धेला सुरुवात\nसंयुक्त अरब अमिरात तयार\nभारत अन सागर यांची जुगलबंदी असलेला ‘झांगडगुत्ता’ लवकरच\nमुंबई : विनोदाचा एक्का समजला जाणारा भारत गणेशपुरे आणि विनोदाची चौफेर फटकेबाजी करणारा सागर कारंडे हे सध्या मराठी मनोरंजन दुनियेतील अग्रगण्य विनोदवीर मानले जातात....\nअखेर प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचा साखरपुडा; पाहा छायाचित्रे\nमुंबई, ता. : अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने आज मुंबई येथे आपला प्रियकर आणि प्रसिद्ध गायक निक जोनास याच्यासोबत साखरपुडा केला. या साखरपुड्याचे छायाचित्र सध्या सोशल...\nसोनी मराठी चॅनल आजपासून सुरु\nमुंबई : मराठी मनोरंजन वाहिन्यांमध्ये ‘सोनी मराठी’च्या रूपाने आणखी एका नव्या वाहिनीची भर पडली असून नुकत्याच पार पडलेल्या ५५व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे...\nएन.टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये झळकणार सचिन खेडेकर\nहैदराबाद :आंध्रप्रदेशमधील लोकांच्या देवस्थानी असलेले तेलगू चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि नेते एन. टी. रामाराव यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटाचे चित्रीकरण सध्या हैदराबादमध्ये सुरु आहे. अभिनेता सचिन...\nमोबाईलचा अतिवापर उडवतोय तरुणांची झोप\nशिरपूरच्या .पटेल फार्मसी महाविद्यालयाचे प्रा.प्रवीण पाटील यांना कर्करोगावरील संशोधनासाठी 33...\nकेरळ पूरग्रस्तांसाठी पेटीएमची ‘निधीसंकलन’द्वारे मदत\nकेरळ : केरळमध्ये बचावकार्य चांगल्या पद्धतीने चालू असून गुगलप्रमाणे पेटीएमनेही यात सहभाग घेत मदतकार्यात उत्साह वाढविला आहे. पेटीएम ने आपल्या ट्विटर पेज वरून लोकांना मदतीसाठी...\nSamsung Galaxy Note 9 कोणत्या दिवशी भारतात लॉन्च होणार जाणून घ्या\nXiaomi Mi A2 चा सेल दुपारी १२ वाजता सुरु होणार\nनाशिकमधील ४२ फुट उंचीचा चारमुखी महाकाय अण्णा गणपती\nब्लू व्हेल सारख्या खुनी ‘मोमो गेम’पासून सावधान\nसातासमुद्रापार भारताचा झेंडा फडकवणारे ‘डावखुरे’\nपाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणार्‍या गाळणखुर्दच्या सीआरएफ जवान प्रविण पाटील यांना राष्ट्रपती पदक\nViral Video : गटारीत हात घालताच सापडले जिवंत बाळ\nक्रिकेटर इम्रान खान यांनी पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणून घेतली शपथ\nकेरळमध्ये पुराने थैमान ; ३२४ जण मृत्युमुखी\nमुलांना अभ्यासेतर उपक्रमांसाठी प्रेरणा द्या : प्रा.नितीन बारी\nचोपडा शहरातील क्रीडा संकुलाचे स्वप्न लवकरच साकार होणार : आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे\nप्रा. विधाते यांच्या कार्यकुशलतेचा पक्षाला फायदा\nमाळीवाडा, जयहिंद बक्षिसाचे मानकरी\nकेरळमधील पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्राकडून 20 कोटींचे अर्थसहाय्य\nघोटीत भंडारदरा चौकाला अटलबिहारी चौक असे नामकरण\nभारत गणेशपुरे आणि सागर कारंडे प्रथमच एकत्र येणार सिनेमात\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/olympus-pen-e-p3-dslr-kit-14-42mm-black-price-p358H5.html", "date_download": "2018-08-18T10:06:36Z", "digest": "sha1:6X6LPKKAMK45OLJ42ABRWVYCMNIUNUK6", "length": 15505, "nlines": 396, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ऑलिंपस Pen E प्३ दसलर किट 14 ४२म्म ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nऑलिंपस पेन E प्३ कॅमेरा\nऑलिंपस Pen E प्३ दसलर किट 14 ४२म्म ब्लॅक\nऑलिंपस Pen E प्३ दसलर किट 14 ४२म्म ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nऑलिंपस Pen E प्३ दसलर किट 14 ४२म्म ब्लॅक\nऑलिंपस Pen E प्३ दसलर किट 14 ४२म्म ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये ऑलिंपस Pen E प्३ दसलर किट 14 ४२म्म ब्लॅक किंमत ## आहे.\nऑलिंपस Pen E प्३ दसलर किट 14 ४२म्म ब्लॅक नवीनतम किंमत Jun 04, 2018वर प्राप्त होते\nऑलिंपस Pen E प्३ दसलर किट 14 ४२म्म ब्लॅकक्रोम उपलब्ध आहे.\nऑलिंपस Pen E प्३ दसलर किट 14 ४२म्म ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे क्रोम ( 21,394)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nऑलिंपस Pen E प्३ दसलर किट 14 ४२म्म ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया ऑलिंपस Pen E प्३ दसलर किट 14 ४२म्म ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nऑलिंपस Pen E प्३ दसलर किट 14 ४२म्म ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nऑलिंपस Pen E प्३ दसलर किट 14 ४२म्म ब्लॅक वैशिष्ट्य\nफोकल लेंग्थ 14 42 mm\nअपेरतुरे रंगे f3.5 f5.6\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12.3 MP\nसेन्सर तुपे MOS Sensor\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 12.3\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nऑलिंपस Pen E प्३ दसलर किट 14 ४२म्म ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%89%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2018-08-18T10:55:50Z", "digest": "sha1:K5SNXZPJJPQTNKYCVNH4XR4LYGVAE5M6", "length": 17731, "nlines": 184, "source_domain": "pcbtoday.in", "title": "उधाणलेल्या तरुणाईला फ्रेंडशिप डे’च याडं लागलं; गिफ्टशॉपीने बाजारपेठाही सजल्या - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे…\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची…\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Pimpri उधाणलेल्या तरुणाईला फ्रेंडशिप डे’च याडं लागलं; गिफ्टशॉपीने बाजारपेठाही सजल्या\nउधाणलेल्या तरुणाईला फ्रेंडशिप डे’च याडं लागलं; गिफ्टशॉपीने बाजारपेठाही सजल्या\nपिंपरी, दि. ३ (ओंकार गोरे) – दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा दिवस ‘फ्रेंडशिप डे’ (मैत्री दिवस) म्हणून जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. तरुणाईला या दिवसाचे प्रचंड वेड लागले आहे. मित्रांबद्दलच्या भावना व्यक्त करण्याची ही एक नामी संधी म्हणूनदेखील या दिनाकडे पाहिले जाते. दोन मित्रांमध्ये भांडण झाले असेल तर, या दिवशी झालेल्या भांडणावर पडदा टाकून नवीन मैत्रीपर्वास सुरुवात केली जाते. त्यामुळे हा दिवस साजरा करण्यासाठी बाजारपेठेत फ्रेंडशिप बँड’ची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून बाजारपेठाही फुलल्या आहेत.\nफ्रेंडशिप डे अवघ्या दोन दिवसावर (रविवारी दि. ५) येवून टेपलाय. सगळीकडे फ्रेंडशिप डे’चा बँड खरेदीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. सध्या बाजारात फ्रेंडशिप बँडची किंमत १० रुपयांपासून सुमारे १५० रुपयापर्यंत आहे. शाळा कॉलेजेस मध्ये आत्ता पासूनच जोरदार तयारी सुरु झाली आहे. दुकानात सगळीकडे फ्रेंडशिप बँड लटकलेले दिसत आहेत व त्याच्या खरेदीस हि चांगला प्रतिसाद तरुण वर्गाकडून मिळत आहे.\nनुकतेच अ‍ॅडमिशन घेऊन विद्यार्थ्यांचे कॉलेज सुरू झालेले आहे. यात नवीन मित्र-मैत्रिणींचे अनेक ग्रुप बघायला मिळतात आणि हेच मित्र फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करण्याचे प्लॅन्स बनवतात. हातावर म्हणजे मनगटापासून ते कोपऱ्यापर्यंतचे हात भरून फ्रेंडशिप बँड बांधून घेणारी तरुणाई पाहिली की त्यांच्या उत्साहाने थक्क व्हायला होते. या डे निमित्त एकमेकांना बँड बांधून मैत्रीची कृतज्ञता व्यक्त करते.\nफ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन डे, फादर्स डे, मदर्स डे, रोज डे, हग डे सारखे नवनवीन डे थाटात साजरे करत तरुणाई नवीन ‘डे कल्चर’ निर्माण करते. अनेकजन तर या ‘डे’च्या निमित्ताने ग्रुपमध्ये फिल्म पाहणे, ट्रिपला जाणे, हॉटेला जाऊन जेवण करणे पसंत करतात. रविवारी (दि. ५) या डे’ची खास धूम पिंपरी-चिंचवडमधेही अनुभवयाला मिळेल.\nPrevious articleएससी/एसटी वर्ग १ हजार वर्षांपासून मागास; सर्वोच्च न्यायालयात केंद्राचे स्पष्टीकरण\nNext articleएससी/एसटी वर्ग १ हजार वर्षांपासून मागास; सर्वोच्च न्यायालयात केंद्राचे स्पष्टीकरण\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा ऐवज जप्त\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात वर्ग\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nपिंपरी रेल्वेस्टेशन जवळ महिलेकडून ९ ग्रॅम बाऊनशुगर जप्त\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nपिंपळेगुरवमध्ये अरुण पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nपराभव दिसत असल्याने भाजपकडून एकत्रित निवडणुकीचे बुजगावणे – पृथ्वीराज चव्हाण\nमुंबईत कंत्राटदाराला मारहाण केल्याप्रकरणी मनसेचे नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nभाजपच्या वतीने आणीबाणी काळातील सत्याग्रहींचा मंगळवारी सत्कार होणार\nपिंपळे सौदागर येथे हॉटेलमधील बाऊन्सरची ग्राहकाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nashik-news/primary-teachers-movement-in-nashik-1628873/", "date_download": "2018-08-18T11:12:11Z", "digest": "sha1:2ZUUFLRMTHJEJ3LQA5FVKRPPGQMUYSGF", "length": 14831, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Primary teachers movement in nashik | प्रलंबित प्रश्नांसाठी प्राथमिक शिक्षकांचे आंदोलन | Loksatta", "raw_content": "\nबेशिस्त वाहनचालकांना ९१ लाखांचा दंड\nपक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा\nपुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित\nजळगावमध्ये महाजन-खडसे गटबाजीची सर्वत्र बाधा\nएमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल\nप्रलंबित प्रश्नांसाठी प्राथमिक शिक्षकांचे आंदोलन\nप्रलंबित प्रश्नांसाठी प्राथमिक शिक्षकांचे आंदोलन\nमहाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या नेतृत्वाखाली गुरुवारी प्राथमिक शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन\nनाशिक जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करताना शिक्षक.\nआश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यास दिरंगाई, परिभाषिक अंशदान योजनेची कपात रक्कम, वेतनास दरमहा होणारा विलंब आदी प्रश्नांबाबत प्रशासन असंवेदनशील असल्याची तक्रार करत\nमहाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या नेतृत्वाखाली गुरुवारी प्राथमिक शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले.\nप्राथमिक शिक्षकांना आश्वासित प्रगती योजनेंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी, निवड श्रेणीचा लाभ देण्याबाबतचा प्रस्ताव दोन ते तीन वर्षांपासून पाठवण्यात आले आहे. त्याबाबत नेहमीच उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. प्रत्येक टप्प्यावर काहीतरी त्रुटी काढून प्रस्ताव परत पाठविले जातात. कित्येक शिक्षकांचे प्रस्ताव कार्यालयाने गहाळ केल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत प्रवेश केलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना डीसीपीएस योजना लागू करण्यात आली. त्यानुसार दरमहा वेतनातून रक्कम वसूल करण्यात आली. रकमेबाबत वित्त विभागाकडे विचारणा केली असता कर्मचारीनिहाय कपातीची पत्रके देण्याचे मान्य करण्यात आले. तथापि, दोन वर्षांचा कालावधी लोटूनही संबंधित रकमेचा हिशेब लेखा विभागास देता आला नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.\nशासन स्तरावरून दरमहा एक तारखेला वेतन देण्यासंबंधीचे आदेश आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी केवळ शिक्षक संवर्गाच्या कर्मचाऱ्यांना लागू होताना दिसत नाही. जिल्हा परिषदेच्या इतर सर्व विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांचे पगार महिन्याच्या सुरुवातीला होतात. परंतु, शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन होण्यास मोठी दिरंगाई होते.\nकधीकधी दोन-तीन महिने विलंबाने वेतन झाल्याची उदाहरणे आहेत. डीसीपीएस योजना रद्द करून जुनीच निवृत्तिवेतन योजना लागू करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.\nशिक्षक संवर्गीय कर्मचाऱ्यांना कामाच्या परिणामकारकतेच्या आधारे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याबाबतचा निर्णय रद्द करून आधीच्या तरतुदींप्रमाणे वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्याचा अहवाल सादर करावा अशी मागणी करण्यात आली. जिल्हा परिषद प्रशासन, प्राथमिक शिक्षकांशी संबंधित प्रश्नांची दखल घेत नसल्याने आजपर्यंत अनेकदा निदर्शनास आले आहे. त्यामुळे शिक्षकांच्या पदोन्नत्या, इतर आस्थापनाविषयक प्रश्न वर्षांनुवर्ष प्रलंबित राहतात.\nमुख्याध्यापक पदोन्नती, पदवीधर शिक्षक पदोन्नती आदी प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहेत. विज्ञान, गणित विषयासाठी आवश्यक अर्हताधारक शिक्षक उपलब्ध न झाल्याने मोठय़ा प्रमाणात ती पदे रिक्त आहेत.\nही पदे बारावी (विज्ञान) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमधून भरण्याची कार्यवाही करावी, मुख्याध्यापक पदांवरील पदोन्नतीची कार्यवाही करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनात शिक्षक सेनेचे उत्तर महाराष्ट्र चिटणीस बबन चव्हाण, धनंजय सटक, प्रशांत खराडे आदी सहभागी झाले होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n पिंपरीत पित्याने दोन मुलांची हत्या करुन केली आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nIt's Official: नात्यावर शिक्कामोर्तब करत अखेर निक-प्रियांका म्हणाले....\nसहजीवनाचा पहिला टप्पा सर, थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा\nइम्रान खानच्या शपथविधीला सिद्धूंना मानाचे स्थान, घेतली लष्करप्रमुखांची गळाभेट\nमिनी एसयुव्हीसारखं डिझाईन असलेली नवीन रेनाँ क्विड वसूल करते तुमचा पै न पै\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nअंतर्गत वाहतुकीसाठी ट्रामचा पर्याय\nवाहनांना एक टोल माफ\nरेल्वेचे संगणकीय आरक्षण केंद्र पावणेतीन तास बंद राहणार\nस्वानंद देणारे शिक्षण निवडा\nवामनदादा कर्डकांना शाहिरीतून अभिवादन\nभूगावमधील हॉटेलमध्ये कोंबडय़ांच्या झुंजीवर जुगार\nपाणी पुरेना आणि म्हणे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/panasonic-lumix-dmc-f5-point-shoot-digital-camera-silver-price-p3181e.html", "date_download": "2018-08-18T10:08:00Z", "digest": "sha1:7NTL7IJ5JMZX2CFO4432HTLDHJN2LURX", "length": 19496, "nlines": 449, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पॅनासॉनिक लुमिक्स दमच फँ५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फँ५ पॉईंट & शूट\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फँ५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फँ५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फँ५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फँ५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये पॅनासॉनिक लुमिक्स दमच फँ५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर किंमत ## आहे.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फँ५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम किंमत Jul 10, 2018वर प्राप्त होते\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फँ५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वरशोषकलुईस, फ्लिपकार्ट, इन्फिबीएम उपलब्ध आहे.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फँ५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर सर्वात कमी किंमत आहे, , जे शोषकलुईस ( 5,749)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फँ५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया पॅनासॉनिक लुमिक्स दमच फँ५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फँ५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 4 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फँ५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फँ५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14.1 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nशटर स्पीड रंगे 8-1/2,000 sec\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 8 sec\nसेल्फ टाइमर 2 sec/10 sec\nरेड इये रेडुकशन Yes\nएक्सपोसुरे कॉम्पेनसशन 1/3 EV Step, \\xC2\\xB1 2 EV\nडिस्प्ले तुपे TFT Screen LCD\nस्क्रीन सिझे 2.7 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230 K dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1280 x 720 pixels (HD)\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 4:3, 3:2, 16:9, 1:1\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC / SDXC\nइनबिल्ट मेमरी Approx. 10 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फँ५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/component/tags/tag/monkey-baat", "date_download": "2018-08-18T10:38:20Z", "digest": "sha1:RDFESXXJA4UZC6Z7NZM4LLLVQJ52XU5C", "length": 4151, "nlines": 154, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Monkey Baat - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nबालचित्रपट ‘मंकी बात’ चा भन्नाट ट्रेलर\n‘मंकी बात’ च्या ‘हाहाकार...’ ला बच्चेकंपनीची पसंती\n‘वायू’ म्हणतोय ‘श्या... कुठे येऊन पडलो यार.....\nउन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी येतोय धम्माल बालचित्रपट - “मंकीबात”\nगायक - संगीतकार - दिग्दर्शक 'अवधूत गुप्ते' चे ‘मंकी बात’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण\nधम्माल बालचित्रपट ‘मंकी बात’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nबालचित्रपट ‘मंकी बात’ चा धम्माल टीझर नक्की पहा\nबालचित्रपट ‘मंकी बात’ येत्या शुक्रवारपासून\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\nतीच धम्माल मस्ती घेऊन पुन्हा येतोय 'बॉईज 2' ५ ऑक्टोबरपासून\n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेमधील हरहुन्नरी लक्ष्मी म्हणजेच अभिनेत्री 'समृद्धी केळकर' झाली \"कथ्थक विशारद\"\n'अमेय वाघ' करणार 'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स' चं सूत्रसंचालन\n\"अंजली स्वीकारणार सईचं आव्हान\" - पहा 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेचा २ तासांचा विशेष भाग १९ ऑगस्टला\nSony Pictures Network चे मराठी मनोरंजन क्षेत्रातले पहिले पाऊल - Sony मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://savarkar.org/mr/sagaras.html", "date_download": "2018-08-18T09:57:04Z", "digest": "sha1:P6B6CFWU2XHL7DLWSUPT2ASSD45I7RPR", "length": 1442, "nlines": 7, "source_domain": "savarkar.org", "title": " सागरास", "raw_content": "\nने मजसी ने परत मातृभूमीला सागरा, प्राण तळमळला भूमातेच्या चरणतला तुज धूतां सागरा, प्राण तळमळला भूमातेच्या चरणतला तुज धूतां मी नित्य पाहिला होता मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ मी नित्य पाहिला होता मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ सृष्टिची विविधता पाहू तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें सृष्टिची विविधता पाहू तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें परि तुवां वचन तिज दिधलें मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन परि तुवां वचन तिज दिधलें मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन त्वरित या परत आणीन विश्वसलो या तव वचनी त्वरित या परत आणीन विश्वसलो या तव वचनी मी जगदनुभव-योगे बनुनी मी तव अधिक शक्त उध्दरणी मी येइन त्वरें कथुन सोडिलें तिजला मी येइन त्वरें कथुन सोडिलें तिजला सागरा, प्राण तळमळला शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं सागरा, प्राण तळमळला शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं ही फसगत झाली तैशी भूविरह कसा सतत साहु यापुढती ही फसगत झाली तैशी भूविरह कसा सतत साहु यापुढती दशदिशा तमोमय होती ..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/600635", "date_download": "2018-08-18T10:26:53Z", "digest": "sha1:BRZPJCHUHZ5WTX3YTI4HUPBS2BMPTKH5", "length": 5980, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नाणार प्रकल्प नाही लादणार - मुख्यमंत्री - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » नाणार प्रकल्प नाही लादणार – मुख्यमंत्री\nनाणार प्रकल्प नाही लादणार – मुख्यमंत्री\nऑनलाईन टीम / मुंबई :\nनाणार प्रकल्प पर्यावरण पूरक असला तरी स्थानिकांचा विरोध डावलून हा प्रकल्प लादणार नाही अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नाणारच्या प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला आहे, नारायण राणेंनी हा प्रकल्प केल्यास राजीनाम्याचा इशारा दिला आहे तसेच स्थानिकांनीही या प्रकल्पाला विरोध केला आहे.\nप्रकल्पाबाबत आत्तापर्यंत राज्य व केंद्र सरकारची भूमिका हा प्रकल्प होणार अशी होती. त्यादृष्टीने विविध विदेशी सरकारांशी व कंपन्यांशीही करारही करण्यात आले होते. मात्र, विधीमंडळास संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी आज पहिल्यांदाच मवाळ भूमिका घेतली असून विरोध कायम राहिला तर नाणार प्रकल्प लादणार नाही अशी भूमिका मांडली आहे. या प्रकल्पाशी संबंधित सगळय़ांशी आमची चर्चा करायची तयारी आहे, इतकेच नाही तर आयआयटी मुंबई, निरी सारख्या संस्थांना प्रकल्पाच्या परिणामांचा अभ्यास करण्याचे काम दिले आहे, विरोधकांशीही चर्चा करण्याची आमची तयारी आहे असं फडणवीस म्हणाले. त्यामुळे चर्चा करूनच पुढे जाण्याची आमची भूमिका असल्याचे फडणवीस म्हणाले. समृद्धी महामार्गालाही मोठय़ाप्रमाणावर विरोध झाला होता, परंतु चर्चेने तो प्रश्न सुटला आणि 93 टक्के जमीन सर्वसहमतीने मिळवण्यात सरकार यशस्वी ठरल्याचे उदाहरण फडणवीसांनी दिले.\nउपग्रह प्रक्षेपणात भारताची आज ‘विक्रमी’ झेप\n2 पाक नौसैनिकांचा भारतीयाने वाचविला जीव\nमोदींना सुप्रिया सुळे मंत्रिमंडळात हव्या आहेत : संजय राऊत\nतामिळनाडूच्या राज्यपालांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/08/24/%E0%A4%91%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8/", "date_download": "2018-08-18T10:52:46Z", "digest": "sha1:IHAKQEBOKDMFHKDYNSZLRBWTNLOYJUTD", "length": 38122, "nlines": 290, "source_domain": "kayvatelte.com", "title": "ऑर्केस्ट्राचे दिवस | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nगणपती उत्सव म्हणजे काय त्यामधे टिळकांचा उद्देश काय होता आणि आता त्याने कुठले स्वरुप घेतले आहे हे लिहिण्यासाठी हे पोस्ट नाही. या विषयावर अनंत वर्ष चर्वण झालेलं आहे. मग गणपती उत्सव म्हंटलं की मला काय आठवतं त्यामधे टिळकांचा उद्देश काय होता आणि आता त्याने कुठले स्वरुप घेतले आहे हे लिहिण्यासाठी हे पोस्ट नाही. या विषयावर अनंत वर्ष चर्वण झालेलं आहे. मग गणपती उत्सव म्हंटलं की मला काय आठवतं ते आज इथे लिहितोय.\nगणपती उत्सवाचे वेध लागले म्हणजे वेगवेगळे ऑर्केस्ट्रा कार्यरत व्हायचे. तेंव्हा काही रिऍलिटी शोज नव्हते, त्यामुळे सगळे छोटे मोठे कलाकार मिळुन ऑर्केस्ट्रा बनवायचे . हे सगळे संगिताला कमिटेड लोकं असायचे . इथे पैसे कमावणे हा उद्देश नसायचा ऑर्केस्ट्रा चा, तर एका मोठ्या ग्रुपसमोर आपली कला सादर करता यावी हा उद्देश असायचा या लोकांचा. आपलं कोणितरी कौतुक करावं बस.. एवढिच अपेक्षा. या ग्रुपमधले लोकं कुठे ना कुठे तरी नौकरी वगैरे करायचे, आणि उरलेल्या वेळात केवळ हॉबी म्हणुन किंवा गाण्यावरचं प्रेम म्हणुन एकत्र येउन ऑर्केस्ट्रात काम करायचे..या ग्रुपमधे तबला वादक, हार्मोनियम, आणि कॅसिओ वादक असायचे . सोबतंच एक ड्रम वाजवणारा तर अगदी मस्ट गणपतिचे दहा दिवस आणि दुर्गादेवीचे १० दिवस या लोकांना खुप डीमांड असायची.रोज कुठे ना कुठे तरी कार्यक्रम असायचा यांचा. मग जवळपासच्या लहान सहान गावांत तर या लोकांना खुप मान असायचा. नागपुरचा मेलोडी मेकर्स हा खुपच फेमस ऑर्केस्ट्रा होता. आजकाल असे ऑर्केस्ट्रा कमी झाले आहेत आणि मराठी गाण्यांचा कार्यक्रम करणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. मुझिक ट्रॅक रेकॉर्डेड असतो, स्टेजवर फक्त गाणं म्हणणारा आणी कॉम्पेअरिंग करणारा बस्स गणपतिचे दहा दिवस आणि दुर्गादेवीचे १० दिवस या लोकांना खुप डीमांड असायची.रोज कुठे ना कुठे तरी कार्यक्रम असायचा यांचा. मग जवळपासच्या लहान सहान गावांत तर या लोकांना खुप मान असायचा. नागपुरचा मेलोडी मेकर्स हा खुपच फेमस ऑर्केस्ट्रा होता. आजकाल असे ऑर्केस्ट्रा कमी झाले आहेत आणि मराठी गाण्यांचा कार्यक्रम करणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. मुझिक ट्रॅक रेकॉर्डेड असतो, स्टेजवर फक्त गाणं म्हणणारा आणी कॉम्पेअरिंग करणारा बस्स नो म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स.. हा नविन ट्रेंड पण पॉप्युलर आहे आजकाल.\nगणपतीची आरती झाली की दहा दिवसांपैकी कमित कमी एक तरी दिवस हा कार्यक्रम व्हायचा. यासाठी मग स्टेज बनवणे , साउंड सिस्टीम भाड्याने आणणे हा खर्च तर असायचाच.लाइटींग साठी एखाद्या पोल वरुन अन ऍथोराइझ्ड कनेक्शन घेतलं जायचं. रात्री आरती नंतर साधारण पणे नऊ च्या सुमारास हा कार्यक्रम सुरु व्हायचा. लेटेस्ट हिट सिनेमाची गाणी , सादर केली जायची. एखाद्या ऑर्केस्ट्रा मधे तर चक्क डान्सर पण असायची, ती एखाद्या पर्टीक्युलर गाण्यावर नाच करायची स्टेजवर . पोलिसांचं पण काही ऑब्जेक्शन नसायचं, रात्री एक वाजे पर्यंत कार्यक्रम सुरु राहिला तरिही. तरुण, तरुणी बरेचदा तर अगदी सहकुटुंब हा कार्यक्रम पहायला जायचे.\nकदाचित असंही वाटेल तुम्हाला, की काय विशेष आहे त्यात पण आजपासुन २५-३० वर्षांपुर्वी करमणुकिचे फारच कमी कार्यक्रम असायचे, त्यामुळे अशा कार्यक्रमाची अगदी आतुरतेने वाट पहायचो आम्ही.अशा कार्यक्रमाची जाहिरात केली जायची, मग आम्हाला पण ऑप्शन असायचा, की आज कुठला ऑर्केस्ट्रा बघायचा ते.\nमाझा एक मित्र आहे अविनाश जोशी, तो अगदी हुबेहुब मुलिच्या आवाजात गाणी म्हणायचा. त्याला पॉप्युलरली वंडरबॉय जोशी म्हंटलं जायचं. त्यामुळे आम्ही नेहेमी अशा कार्यक्रमात व्हिआयपी असायचॊ. अगदी खरं सांगायचं तर रेकॉर्ड डान्स पहायला जास्त आवडायचं.\nकधी तरी एखाद्या ठिकाणी जादुचे प्रयोग पण अरेंज केले जायचे. हे सगळे कार्यक्र अगदी ओपन स्टेजवर असायचे. एखादं गणेशोत्सव मंडळ आपल्याच मंडळातल्या मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवायचे. त्या मधे अगदी दोन वर्षांच्या चिमी पासुन तर ५० वर्षांच्या देशमुख काकांपर्यंत सगळे भाग घ्यायचे. ज्या कोणाला थोडं तरी गाण्याचं अंग आहे तो आपलं कसब दाखवायला पुढे यायचा. वय हा काही क्रायटेरिया नसायचा. कधी तरी नाटकं पण बसवली जायची.\nरस्त्यावर पडदा लाउन रात्री त्यावर सिनेमा दाखवला जायचा. १६ एम एम ची फिल्म आणि ओपन एअर थिएटर. पडद्याशेजारिच मोठे स्पिकर्स असायचे. पडद्याच्या दोन्ही साईडनी लोकं बसायचे सिनेमा पहायला. या मधे पण एक गम्मत असायची. पडद्याच्या विरुध्द दिशेने पाहिले की उलटं चित्र दिसायचं – उलटं म्हणजे साडिचा पदर उलटा घेतलेला दिसणं वगैरे वगैरे.. पण तशाही परिस्थितित लोकं सिनेमा एंजॉय करायचे. अमिताभ बच्चनचा दिवार तर नेहेमिच दाखवला जायचा. तसेच आराधना हा ऑल टाइम फेवरेट होता.\nरात्री ७ वाजताच सगळे मित्र मिळुन गणपती बघायला म्हणून जायचो. आणि रात्री दिड ते दोन नंतर घरी परत जायचो. नंतर काही वर्षांनी पुण्याला आल्यावर गणपती पहाणे हा एक महत्वाचा उद्योग रहायचा. मी रहायचॊ सदाशिवात कॉट बेसिसवर.. त्यामुळे तिथुन रोज रात्री जवळपासचे गणपती पहायला जाणे सोपे व्हायचे. पुण्याचे गणपती म्हणजे आरास .. सुंदर आरास केली जायची. (अजुनही केली जाते) पण हल्ली पुण्याला गणपती पहायला म्हणुन जात नाही.\nआता इतकी वर्षं झालीत, मुंबईला लालबागचा राजा पहायला जायचे म्हणजे कमित कमी तिन चार तासांची निचंती. इतका वेळ नसतो, त्यामुळे इतर ठिकाणी जाउन पहातो शक्य होइल तितके गणपती. मुंबईला गणपतीच्या पेंडॉलमधे जाण्यासाठी रांगेतच जावं लागतं. पुण्याप्रमाणे, गणपतीची मुर्ती बाहेरुन येता जातांना दिसत नाही. कारण मुर्ती समोर चक्क पडदा लाउन बंद केलेला असतो. कदाचित पोल्युशन मुळे मुर्ती खराब होऊ नये म्हणुन असे असावे..\nअसो… सिध्दीविनायकाला एकदा तरी जाउन यायचं असतं गणपतिमधे. त्यामुळे एखाद्या वर्किंग डे ला दुपारी चक्कर मारली तर चांगलं दर्शन होतं. ( अर्थात मंगळवार सोडुन )\nगणपती उत्सव म्हणजे काय त्यामधे टिळकांचा उद्देश काय होता आणि आता त्याने कुठले स्वरुप घेतले आहे हे लिहिण्यासाठी हे पोस्ट नाही. या विषयावर अनंत वर्ष चर्वण झालेलं आहे. मग गणपती उत्सव म्हंटलं की मला काय आठवतं त्यामधे टिळकांचा उद्देश काय होता आणि आता त्याने कुठले स्वरुप घेतले आहे हे लिहिण्यासाठी हे पोस्ट नाही. या विषयावर अनंत वर्ष चर्वण झालेलं आहे. मग गणपती उत्सव म्हंटलं की मला काय आठवतं ते आज इथे लिहितोय.\nगणपती उत्सवाचे वेध लागले म्हणजे वेगवेगळे ऑर्केस्ट्रा कार्यरत व्हायचे. तेंव्हा काही रिऍलिटी शोज नव्हते, त्यामुळे सगळे छोटे मोठे कलाकार मिळून ऑर्केस्ट्रा बनवायचे . हे सगळे संगीताला कमिटेड लोकं असायचे . इथे पैसे कमावणे हा उद्देश नसायचा ऑर्केस्ट्रा चा, तर एका मोठ्या गृपसमोर आपली कला सादर करता यावी हा उद्देश असायचा या लोकांचा. आपलं कोणीतरी कौतुक करावं बस.. एवढीच अपेक्षा.\nया ग्रुपमधले लोकं कुठे ना कुठे तरी नोकरी वगैरे करायचे, आणि उरलेल्या वेळात केवळ हॉबी म्हणून किंवा गाण्यावरचं प्रेम म्हणून एकत्र येउन ऑर्केस्ट्रा मध्ये काम करायचे..यागृपमधे तबला वादक, हार्मोनियम, आणि कॅसीओ वादक असायचे . सोबतच एक ड्रम वाजवणारा तर अगदी मस्टएखाद्या गाण्यामधे जर खूप ड्रम बिट्स असले की मग त्या ड्रम वाजवणाऱ्या ला बघायलाच मजा यायची. त्याची ती डौलदार हालचाल.. मस्त वाटायची पहायला.\nगणपतीचे दहा दिवस आणि दुर्गा देवीचे १० दिवस या लोकांना खूप मागणी असायची.रोज कुठे ना कुठे तरी कार्यक्रम असायचा यांचा. मग जवळपासच्या लहान सहान गावांत तर या लोकांना खूप मान असायचा. नागपूरचा मेलोडी मेकर्स हा खूप प्रसिद्ध ऑर्केस्ट्रा होता.\nआजकाल असे हिंदी सिनेमाची गाणी म्हणणारे ऑर्केस्ट्रा कमी झाले आहेत आणि मराठी गाण्यांचा कार्यक्रम करणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. म्युझीक ट्रॅक रेकॉर्डेड असतो, स्टेजवर फक्त गाणं म्हणणारा आणि कॉम्पेअरिंग करणारा बस्स नो म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स.. हा न्वीन ट्रेंड पण पॉप्युलर आहे आजकाल.\nगणपतीची आरती झाली की दहा दिवसांपैकी कमीत कमी एक तरी दिवस हा कार्यक्रम व्हायचा. यासाठी मग स्टेज बनवणे , साउंड सिस्टीम भाड्याने आणणे हा खर्च तर असायचाच.लाइटींग साठी एखाद्या पोल वरुन आ्णि ऍथोराइझ्ड कनेक्शन घेतलं जायचं. रात्री आरती नंतर साधारण पणे नऊ च्या सुमारास हा कार्यक्रम सुरु व्हायचा. लेटेस्ट सिनेमाची गाणी , सादर केली जायची.\nएखाद्या ऑर्केस्ट्रा मधे तर चक्क डान्सर पण असायची, ती एखाद्या खास गाण्यावर नाच करायची स्टेजवर . पोलीसांचं पण काही ऑब्जेक्शन नसायचं, रात्री एक वाजे पर्यंत कार्यक्रम सुरु राहिला तरीही. तरुण, तरुणी बरेचदा तर अगदी सहकुटुंब हा कार्यक्रम पहायला जायचे.\nकदाचित असंही वाटेल तुम्हाला, की काय विशेष आहे त्यात पण आजपासून २५-३० वर्षांपूर्वी करमणूकिचे फारच कमी कार्यक्रम असायचे, त्यामुळे अशा कार्यक्रमाची अगदी आतुरतेने वाट पहायचो आम्ही.अशा कार्यक्रमाची जाहिरात केली जायची.एकाच दिवशी निरनिराळ्या गणेश मंडळात बरेच कार्यक्रम असायचे. मग आम्हाला पण ऑप्शन असायचा, की आज कुठला ऑर्केस्ट्रा बघायचा ते.\nमाझा एक मित्र आहे अविनाश जोशी, तो अगदी हुबेहूब मुलीच्या आवाजात गाणी म्हणायचा. त्याला वंडरबॉय जोशी म्हंटलं जायचं.मग काय अव्या आमचा मित्र आहे म्हणून आम्ही पण कॉलर टाईट करुन फिरायचो. अव्याचा ऑर्केस्ट्रा असला की आम्ही सगळे तिकडेच जायचो. अगदी खरं सांगायचं तर रेकॉर्ड डान्स पहायला जास्त आवडायचं.\nकधी तरी एखाद्या ठिकाणी जा्दूचे प्रयोग पण अरेंज केले जायचे. हे सगळे कार्यक्रम अगदी ओपन स्टेजवर असायचे. एखादं गणेशोत्सव मंडळ आपल्याच मंडळातल्या मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवायचे. त्या मधे अगदी दोन वर्षांच्या चिमी पासून तर ५० वर्षांच्या देशमुख काकांपर्यंत सगळे भाग घ्यायचे. ज्या कोणाला थोडं तरी गाण्याचं अंग आहे तो आपलं कसब दाखवायला पुढे यायचा. वय हा काही क्रायटेरिया नसायचा. कधी तरी नाटकं पण बसवली जायची.\nसगळ्यात पॉप्युलर म्हणजे हिंदी सिनेमा. हिंदी सिनेमा दाखवला नाही तर गणेशोत्सव पुर्ण झालाच नाही सिनेमा शिवाय काय गणेशौत्सव सिनेमा शिवाय काय गणेशौत्सव रस्त्यावर पडदा लावून रात्री त्यावर सिनेमा दाखवला जायचा. १६ एम एम ची फिल्म आणि ओपन एअर थिएटर. पडद्याशेजारीच मोठे स्पिकर्स असायचे. पडद्याच्या दोन्ही बाजूने लोकं बसायचे सिनेमा पहायला. या मधे पण एक गम्मत असायची. पडद्याच्या विरुद्ध दिशेने पाहिले की उलटं चित्र दिसायचं – उलटं म्हणजे साडीचा पदर उलटा घेतलेला दिसणं वगैरे वगैरे.. पण तशाही परिस्थितीत लोकं सिनेमा एंजॉय करायचे. अमिताभ बच्चनचा दीवार तर नेहेमीच दाखवला जायचा. तसेच आराधना हा ऑल टाइम फेवरेट होता.\nरात्री ७ वाजताच सगळे मित्र मिळून गणपती बघायला म्हणून जायचो. आणि रात्री दिड ते दोन नंतर घरी परत जायचो. नंतर काही वर्षांनी पुण्याला आल्यावर गणपती पहाणे हा एक महत्वाचा उद्योग रहायचा. मी रहायचॊ सदाशीवात कॉट बेसिसवर.. त्यामुळे तिथुन रोज रात्री जवळपासचे गणपती पहायला जाणे सोपे व्हायचे. पुण्याचे गणपती म्हणजे आरास .. सुंदर आरास केली जायची. (अजूनही केली जाते) पण हल्ली पुण्याला गणपती पहायला म्हणून जात नाही.\nआता इतकी वर्षं झालीत, मुंबईला लालबागचा राजा पहायला जायचे म्हणजे कमीत कमी तिन चार तासांची निचंती. इतका वेळ नसतो, त्यामुळे इतर ठिकाणी जाउन पहातो शक्य होईल तितके गणपती. मुंबईला गणपतीच्या पेंडॉलमधे जाण्यासाठी रांगेतच जावं लागतं. पुण्याप्रमाणे, गणपतीची मुर्ती बाहेरून येता जातांना दिसत नाही. कारण मुर्ती समोर चक्क पडदा लावून बंद केलेला असतो. कदाचित पोल्युशन मुळे मुर्ती खराब होऊ नये म्हणून असे असावे..\nअसो… सिध्दीविनायकाला एकदा तरी जाउन यायचं असतं गणपती मधे. त्यामुळे एखाद्या वर्किंग डे ला दुपारी चक्कर मारली तर चांगलं दर्शन होतं.गणपती बाप्पा मोरया..\n12 Responses to ऑर्केस्ट्राचे दिवस\nबर्‍याच आठवणी जाग्या झाल्या…… मी पाहिलेले एक-दोन ऑर्केस्ट्रा आठवणींत आहेत.. मिमिक्री सोबत – मराठी – हिंदी गाणी असायची आणि मस्त डांस ही… आपण म्हटल्याप्रमाणे – रेकॉर्ड डांसला मजा यायची\nगावी गणेत्सोवात ऑर्केस्ट्रा, सिनेमा, नाटकं दाखवली जायची… शिवाय देखावेही असायचेच प्रत्येक मंडळात कशी चुरस असायची\nधन्यवाद. खरंच ते दिवस आठवले की अजुनही काहितरी मिस करतोय असं वाटतं.\nहो खरच. पडद्यावर सिनेमे पाहायला मजा यायची. एकदा मी लहान असताना घरी न सांगता सिनेमा बघायला गेलो होतो. घरचे शोधून शोधून दमले. मग त्यांना वाटले की मी सिनेमा पाहत असें म्हणून त्यांनी सिनेमा मध्ये थांबवून अनाउन्स्मेंट केली की पप्पू पाताडे नावाचा छोटा मुलगा हरवला आहे म्हणून 🙂 मग घरी गेल्यावर त्या सिनेमातल्या हिरोने व्हिलनला जितका मारला नसेल त्याच्या दुप्पट मार मला पडला होता 🙂\nरस्त्यावर पाहिलेल्या सिनेमाची गम्मत काही वेगळीच. कधी तरी शेवटची रिल आधी लागायची … मग काय.. आधी शेवट आणी नंतर सिनेमा. तरिही कोणीच कम्प्लेंट करित नसे.\nमाझ्या लहानपणी गणपती मंडपात पिक्चर पहाय्ला मिळणे म्हणजे फार मोठी गोष्ट असायची. विसिअर ट् टिव्ही भाड्याने आणून पिक्चर पहायले जायचे. त्यावर किती तरी दिवस चर्चा करायचो. शाळेत सुद्धा पिक्चर ची ष्टोरी सांगताना भाव खायचो. मस्त दिवस.\nअगदी अगदी, अनेकदा मधलेच नाहीतर शेवटचे रिळ आधी लागे मग शिट्यांचा पाउस पडे.:D हे इतके कॊमन होते की चुकून जर सगळे सुरळीत झाले तर बरेच जणांना चुकल्य़ासारखे वाटत असेल. मस्त दिवस होते ते. बाप्पा मोरया\nते व्हिसिआर आणुन रात्रभर सिनेमा पहाणे, ते पण दिवस होते काही वर्षं. माझं लहानपण अगदी लहान गावात गेल्यामुळे नविन सिनेमा जवळपास एक वर्षानंतर यायचा. त्यामुळे कोणी नागपुरला जाउन आला, की आल्यावर त्या सिनेमाची स्टॊरी सांगायचा.. अगदी इथ्यंभुत आणि ऐकणारे पण एखादं प्रवचन ऐकावं तेवढ्याच तन्मयतेने ऐकायचे ते\nशेवटचे रिळ आधी लागणे.. हे तर नेहेमिच व्हायचं. खरं सांगायचं तर रात्री बेरात्री ऑर्केस्ट्रा, किंवा सिनेमा पहाण्याच्या निमित्ताने ’ती’ला पहायला (नुसतं पहायलाच बरं कां.. आम्ही फारच अल्प संतुष्टी होतो) म्हणुनही घराबाहेर पडलं जायचं. मज्जा यायची… 🙂\nकाका, मस्तच झालीय पोस्ट. जुन्या आठवणी जागवल्या.\nमला चांगलं आठवतंय “तडप तडप के इस दिलसे” हे गाणं मी पहिल्यांदा गणेशोत्सवाच्या ऑर्केस्ट्रामध्येच ऐकलं होतं.\nबाय द वे “मुझिक ट्रॅक रेकॉर्डेड असतो, स्टेजवर फक्त गाणं म्हणणारा आणी कॉम्पेअरिंग करणारा बस्स” या प्रकाराला कराओके (की काराओके) असं म्हणतात बरं का 🙂\nबऱ्याच जुन्या गोष्टी मिस करतो, त्यातली ही पण एक. १० वर्ष तरी नेमाने रात्री हुंदडायला जायचो. 🙂\nते कराओके बद्दल ऐकलंय. सध्या नागपुरला एक नदीकिनारी नावाचा चांगला कार्यक्रम होतो याच धर्तीवर…\nमला पण गणपती मध्‍ये खुप मजा यायची.त्या दहा दिवसात रोज नविन नविन स्पर्धा असायच्या लहानपणीची मजाच काही वेगळी होती..आम्ही स्वत: ढोल ताशे वाजवायचो..खुप खुप मजा यायची..गणपती बाप्पा मोरया….\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nसिक्रेट मेसेज कसा पाठवायचा\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/haryana-woman-ias-officer-accuses-senior-sexually-harassing-122983", "date_download": "2018-08-18T10:29:22Z", "digest": "sha1:ZPYXWRNQXDCB77MZIFLGCDY7MIM66JJC", "length": 18458, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Haryana woman IAS officer accuses senior of sexually harassing वरिष्ठ अधिकाऱ्याकडून महिला आयएएस अधिकाऱ्याचा लैंगिक छळ | eSakal", "raw_content": "\nवरिष्ठ अधिकाऱ्याकडून महिला आयएएस अधिकाऱ्याचा लैंगिक छळ\nसोमवार, 11 जून 2018\nहरयाना : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) महिला अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे, परंतु तो आरोप अधिकाऱ्याने नाकारला आहे. 28 वर्षीय महिलेने फेसबुकवर हिंदीमध्ये लिहून तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर आरोप केला की, \"अधिकृत फाइल्सवर प्रतिकूल प्रतिक्रिया दिल्यामुळे वरिष्ठ अधिकारी मला लैंगिकरित्या त्रास देत आहेत. यासंदर्भात आपली तक्रार तिने चंदीगड पोलिसांना रविवारी ईमेलद्वारे पाठविली आहे, त्याचबरोबर सक्षम अधिकाऱ्याकडेही तिने तक्रार दाखल केली आहे.\nहरयाना : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) महिला अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे, परंतु तो आरोप अधिकाऱ्याने नाकारला आहे. 28 वर्षीय महिलेने फेसबुकवर हिंदीमध्ये लिहून तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर आरोप केला की, \"अधिकृत फाइल्सवर प्रतिकूल प्रतिक्रिया दिल्यामुळे वरिष्ठ अधिकारी मला लैंगिकरित्या त्रास देत आहेत. यासंदर्भात आपली तक्रार तिने चंदीगड पोलिसांना रविवारी ईमेलद्वारे पाठविली आहे, त्याचबरोबर सक्षम अधिकाऱ्याकडेही तिने तक्रार दाखल केली आहे. राज्याचे मुख्य सचिव डी.एस.धेसी यांना वारंवार फोन कॉल्स व मेसेजेस करुनही प्रतिसाद मिळू शकला नाही, त्यामुळे महिलेने लेखी तक्रारीचे पाऊल उचलले आहे. तिने पुढे सांगितले की, वरिष्ठ अधिकाऱ्याने तिला धमकी दिली आहे की, \"अधिकृत फाइल्सवर प्रतिकूल प्रतिक्रिया लिहिल्यास त्याचा परिणाम तिच्या वार्षिक गोपनीय अहवाला (एसीआर) वर होईल.\"\nतथापि, आरोपी अधिकाऱ्याने त्याच्या विरोधातील हा आरोप नाकारला आहे आणि तो म्हणाला, \"मी तिला सल्ला दिला होता की, ज्या फाईल्स इतर अधिकाऱ्यांकडून सर्व आवश्यक चूका दुरुस्त केल्यानंतर तुझ्याकडे आल्या आहेत, अशा फाईल्समध्ये दोष शोधू नको. \"फेसबूक पोस्टमध्ये महिलेने आरोप केला आहे की, तिचे वरिष्ठ अधिकारी तिला सात-आठ वाजेपर्यंत कार्यरत राहण्याची सक्ती करत असे. 22 मे रोजी दुपारी त्यांनी मला सांगितले की, मी माझ्या पद्धतीने या फाइलमध्ये सुधारणा करतो आणि त्यांनी फाईल्सवर प्रतिकूल प्रतिक्रिया नोंदवण्यास नकार दिला. \"ते म्हणाले, जर मी त्यांच्या मार्गदर्शनाचे पालन केले नाही, तर ते माझी बदली दुसऱ्या ठिकाणी करतील. त्यांनी माझा एसीआर (वार्षिक गोपनीय अहवाल) रिपोर्ट बदलण्याची धमकी दिली.\"\n\"वरिष्ठ अधिकाऱ्याने मला 31 मे रोजी एका खोलीत बोलावून घेतले आणि बाकी अधिकाऱ्यांना त्या खोलीत प्रवेश न करण्यास बजावले. त्यांनी मला विचारले की, मला कोणत्या प्रकारचे काम करायचे आहे, विभागीय की किरकोळ काम आणि मग त्यांनी मला फाईल्सवर प्रतिकूल प्रतिक्रिया लिहणे बंद करण्यास सांगितले. त्यांनी मला सांगितले की, नववधूला ज्याप्रमाणे गोष्टी समजावून सांगितल्या जातात, त्याप्रमाणेच मी तुला समजावून सांगेल. त्यावेळी त्यांचे वर्तन अनैतिक होते.\"\nपरंतु उच्च अधिकाऱ्याने वरील आरोपांना \"निराधार\" म्हटले आहे आणि मी कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. \"तिची महिन्याभरापूर्वी माझ्या विभागात बदली झाली आहे, तिने माझ्या कर्मचाऱ्यांकडेही चुकीच्या गोष्टी बोलल्या होत्या. मी त्यांना त्याकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले.\n\"माझ्या विभागामार्फत कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून योग्य काम करुन घेणे हे माझे कर्तव्य आहे आणि मी बऱ्याचवेळा तिला अधिकृत फाइल्समध्ये चुका असल्याचे सांगितले होते, परंतु त्या चुका समजावून सांगण्यात काही गैर नाही.\"असे ते म्हणाले.\nफेसबुक पोस्टमध्ये महिलेने लिहिले की, पोलिस सुरक्षा काढून घेतली होती, त्यामुळे तिने त्या घटनेबद्दल राष्ट्रपती कार्यालयात ई-मेल पाठविला आहे.\nबुधवारी (6 जून) तिने आरोप केला की वरिष्ठ अधिकाऱ्याने 5 वाजता मला कार्यालयात बोलावून घेतले आणि सायंकाळी 7.39 पर्यंत तिथेच थांबण्यास सांगितले. \"मी त्याच्या टेबलच्या समोरच्या खुर्चीवर बसले होते. त्याने मला उठायला सांगितले आणि त्याच्या खुर्चीच्या जवळ ओढले. संगणकावर कसे काम करावे हे समजावण्याच्या उद्देशाने त्याने मला जवळ ओढून मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.\"\nयावर अधिकारी म्हणाला, \"ती ऑफिसमध्ये उपस्थित असताना माझ्या कार्यालयात कोणीतरी असेल असाच प्रयत्न मी केला आहे. मला नाही वाटत, जास्तीत जास्त दोन वेळा काही मिनिटे वगळली तर ती माझ्या ऑफिसमध्ये एकटी नव्हती. \"आपल्या दाव्याचे स्पष्टीकरण देताना महिला म्हणाली, \"जे काही ते त्याच्या बचावात सांगत आहेत ते खोटे आहे. मी माझ्या फेसबुक पोस्टमध्ये संपूर्ण तपशील दिला आहे. तुम्ही सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करा. सर्व गोष्टी स्पष्ट होतील.\"\nपिंपरी - दोन मुलांना मारून वडिलांची आत्महत्या\nपिंपरी (पुणे) - दोन मुलांना मारून वडिलांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना शनिवारी दुपारी ताथवडे येथे घडली. शुभम बर्मन (वय १०) रूपम वर्मा (वय...\nMaratha Kranti Morcha : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री आंदोलन\nपुणे : मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे सोमवारपासून (ता.20) मराठा आरक्षणासाठी आणि विविध मागण्यांसाठी पुणे विभागीय आयुक्त...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/504409", "date_download": "2018-08-18T10:27:58Z", "digest": "sha1:TSIRZK47KRVXVKSL7ZZJSD2HMKOFBR5R", "length": 7146, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "महापौरांनी घेतली कामकाजाची माहिती - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » महापौरांनी घेतली कामकाजाची माहिती\nमहापौरांनी घेतली कामकाजाची माहिती\nमहापालिकेतील विविध विभागातील कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. विशेषत: लेखा विभागाकडून बिले अदा करण्यास विलंब होत आहे. इमारत बांधकाम परवाना देण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. यामुळे महापौर संज्योत बांदेकर यांनी शुक्रवारी लेखा, सार्वजनिक बांधकाम आणि महसूल विभागात भेट देऊन समस्यांची माहिती जाणून घेतली. नागरिकांची कामे विनाविलंब करण्याचा आदेश दिला.\nइमारत बांधकाम परवानगीकरिता नागरिकांना महापालिकेच्या पायऱया झिजवाव्या लागत आहेत. सात दिवसात इमारत बांधकाम परवानगी देण्याचा आदेश महापालिकेला नगरविकास खात्याने दिला आहे. पण याची अंमलबजावणी करण्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. तसेच लेखा विभागाकडून बिले वेळेत अदा करण्यास टाळाटाळ केली जात आहे. महापालिकेच्यावतीने विविध योजनेंतर्गत धनादेश देण्यास विलंब होत असून काही कर्मचाऱयांच्या रुग्णालयाची बिले तसेच निवृत्तीवेतनाच्या फाईल्स पुढे सरकत नसल्याबाबत महापौरांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. यामुळे महापौरांनी लेखा, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागात भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली.\nलेखा विभागामध्ये कर्मचारी अपुरे असल्याची माहिती लेखा अधिकारी रामाप्पा हट्टी यांनी दिली, तसेच लेखा विभागाच्या कार्यालयासाठी जागा अपुरी असल्याने कार्यालयाचा विस्तार करण्यासाठी कर्मचारी आणि जागेची आवश्यकता असल्याची माहिती महापौरांना देण्यात आली. इमारत बांधकाम परवानगी देण्यास विलंब होण्याची कारणे विचारण्यात आली. यासाठी अपुरे कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले. तिन्ही विभागांची माहिती घेऊन नागरिकांना कोणत्याही प्रकारे अडचणी होणार नाहीत, याची दक्षता घेण्याची सूचना देऊन अडलेल्या फाईल विनाविलंब निकालात काढण्याचा आदेश महापौरांनी दिला. यावेळी माजी महापौर सरिता पाटील, नगरसेविका माया कडोलकर, नगरसेवक राकेश पलंगे आदी उपस्थित होते.\nहॉटेल सहारामध्ये मारहाण : तिघे जखमी\nनिपाणीत स्वामी समर्थ पालखीचे स्वागत\nमनपा कंत्राटदाराने केला नगरसेवकावर हल्ला\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/600639", "date_download": "2018-08-18T10:27:01Z", "digest": "sha1:NGWOSRJWQDO6EFITWX3XKFX2HCDMH6BF", "length": 7093, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अयोध्या वादातील ‘ती’ जमीन राम मंदिराला - शिया बोर्ड - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » अयोध्या वादातील ‘ती’ जमीन राम मंदिराला – शिया बोर्ड\nअयोध्या वादातील ‘ती’ जमीन राम मंदिराला – शिया बोर्ड\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nअयोध्यामधील मुस्लिमांना मिळालेल्या वादग्रस्त जमिनीचा खरा दावेदार केंद्रीय शिया वक्फ बोर्ड आहे. कारण बाबरी मशीद मीर बाकी यांनी बनवली होती व ते एक शिया होते. त्यामुळे अलाहाबाद हायकोर्टाने मुस्लिमांना दिलेली एक तृतियांश जमीन राम मंदिर बनवण्यासाठी हिंदुंना दान द्यायची आहे, असे आज केंद्रीय शिया वक्फ बोर्डाने सुप्रीम कोर्टात स्पष्ट केले.\nशिया वक्फ बोर्डाच्यावतीने ज्ये÷ वकील एस. एन. सिंह यांनी सुप्रीम कोर्टात ही माहिती दिली. देशाची एकता, शांती आणि सद्भावना यासाठी शिया वक्फ बोर्ड अयोध्यामधील वादग्रस्त जमीन राममंदिरासाठी दान करण्याच्या बाजुने आहे. तर दुसरीकडे, बामियान बुद्धाच्या मूर्त्यांना मुस्लिम तालिबानने नष्ट केले होते तर बाबरी मशिदीला हिंदू तालिबानने उद्ध्वस्त केले आहे, असे मुस्लिम आणि सुन्नी वक्फ बोर्डाचे ज्ये÷ वकील राजीव धवन म्हणाले. याआगोदर शिया बोर्डाने ही जमीन दान करण्याचे म्हटले आहे. सुप्रीम कोर्टात आज मुस्लिम पक्षकारांची राम मंदिराच्या जमिनीसंबंधी सुनावणी करण्यात आली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश अशोक भूषण आणि न्यायाधीश एस. एस नजीर यांच्या विशेष खंडपीठासमोर 17 मे रोजी हिंदू संघटनांची सुनावणी झाली होती. राममंदिरासाठी झालेल्या आंदोलनात 6 डिसेंबर 1992 साली अयोध्यामधील बाबरी मशीद पाडण्यात आली होती. अलाहाबाद हायकोर्टाने 30 सप्टेंबर 2010 साली अयोध्या टायटल वादाप्रकरणी निर्णय दिला होता. त्यावेळी कोर्टाने स्पष्टपणे सांगितले होते की, वादग्रस्त जमिनीचे तीन भाग झाले पाहिजेत. ज्या जागेवर रामची मूर्ती आहे ती जागा रामला द्यायला हवी. सीता रसोई आणि राम चबुतरा निर्मोही आखाडय़ाला समान जागावाटप झाल्यानंतर उर्वरित एक तृतियांश जागा सुन्नी वक्फ बोर्डाला द्यायला हवी, असे कोर्टाने आदेश दिले होते.\nनासाच्या नव्या मोहिमेसाठी भारतीय व्यक्तीची निवड\nचिनी भाषेचे धडे गिरवणार आयटीबीपीचे जवान\nगुजरातमध्ये दलिताच्या आत्महत्येमुळे तणाव\nभविष्यातील युद्धाच्या तयारीत भारतीय सैन्य\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/strawbery-rasberi-gujberi-36419", "date_download": "2018-08-18T11:06:23Z", "digest": "sha1:QDR43EBXN7TRT4A2CFI2OQZESJ55DMU6", "length": 15322, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "strawbery rasberi, gujberi स्ट्रॉबेरीच्या जोडीला रासबेरी, गुजबेरीची गोडी... | eSakal", "raw_content": "\nस्ट्रॉबेरीच्या जोडीला रासबेरी, गुजबेरीची गोडी...\nगुरुवार, 23 मार्च 2017\nपाचगणीच्या वातावरणात विविध जातींना बहर; आंबोळकी बाजारपेठेत दाखल\nपाचगणी - नवनवीन जाती आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे स्ट्रॉबेरीच्या फळाने या भागात आपले साम्राज्य निर्माण केले असले तरी, थंड हवेची खासियत असलेल्या या फळाच्या जोडीला रासबेरी, गुजबेरी, मलबेरी, चेरी टोमॅटोनेही हजेरी लावली आहे. तर काही वर्षांपूर्वी ‘एन्ट्री’ केलेल्या रेड राजबेरी ने ‘एक्‍झिट’ घेतली आहे. रेड कॅबेज, ब्रोकोलीचा हंगाम अंतिम टप्प्याकडे वाटचाल करू लागला आहे.\nपाचगणीच्या वातावरणात विविध जातींना बहर; आंबोळकी बाजारपेठेत दाखल\nपाचगणी - नवनवीन जाती आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे स्ट्रॉबेरीच्या फळाने या भागात आपले साम्राज्य निर्माण केले असले तरी, थंड हवेची खासियत असलेल्या या फळाच्या जोडीला रासबेरी, गुजबेरी, मलबेरी, चेरी टोमॅटोनेही हजेरी लावली आहे. तर काही वर्षांपूर्वी ‘एन्ट्री’ केलेल्या रेड राजबेरी ने ‘एक्‍झिट’ घेतली आहे. रेड कॅबेज, ब्रोकोलीचा हंगाम अंतिम टप्प्याकडे वाटचाल करू लागला आहे.\nसह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर विराजमान झालेल्या पाचगणी, महाबळेश्वर म्हणजे नैसर्गिक संपत्तीचा खजिना.. मलबेरी, राजबेरी, गुजबेरी, तोरणे, आंबोळकी, जांभूळ म्हणजे या भागातील डोंगरीमेवा. जुन्या जातीचा ऑस्ट्रिया, निग्रो व बंगलोर जातीच्या स्ट्रॉबेरीला बगल देऊन कॅलिफोर्निया स्ट्रॉबेरीने या भागात साम्राज्य प्रस्थापित केले आहे. नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्रास शेतकऱ्यांनी या पिकाकडे मोर्चा वळविला आहे. यावर्षी आकाराने मोठे, चविष्ट, रुचकर असलेले हे फळ बाजारपेठेत मुबलक प्रमाणात दाखल झाले असून त्याच्या जोडीला ब्लॅक राजबेरी, गुजबेरी, मलबेरी, चेरी टोमॅटो दृष्टीस पडत आहे. स्थानिक बाजारपेठेत स्ट्रॉबेरी ८० रुपये, राजबेरी ३००, गुजबेरी ३००, चेरी टोमॅटो ८० रुपये किलोने मिळत आहे. तर, इतिहासजमा होत असलेल्या मलबेरीने अल्पशा प्रमाणात हजेरी लावली असून प्रति किलोस हजार रुपयांचा दर मिळविला आहे.\nइतिहासजमा होण्याच्या मार्गावर असलेल्या ब्लॅक राजबेरीचे उत्पन्न यावर्षी समाधानकारक असल्याचे अवकाळी येथील शेतकरी प्रवीण डोईफोडे यांनी सांगितले. राजबेरीचे फळ अति नाशवंत असल्याने तिचा फ्रुट म्हणून कोणीही स्वीकार केलेला नसल्याचे सांगताना पांगारीचे शेतकरी महेंद्र पांगारे यांनी सांगितले, की ‘मलबेरी घाऊक बाजारपेठेत निर्यात होऊ शकली नाही.\nपण, शेतात जाऊन त्याचा स्वाद घेणे अनेकजण पसंद करतात. दरम्यान, करवंदे, तोरणं, जांभूळ या अन्य रानमेव्याची प्रतीक्षा होत असताना आंबोळकी मात्र बाजारपेठेत दाखल झाली आहे. त्याशिवाय चेरी टोमॅटोही मुबलक प्रमाणात दृष्टीस पडत असून मुळच्या युरोपच्या रेड कॅबेज व ब्रोकोली यांनीही चांगले ठाण मांडले आहे. पण, त्यांचा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोचला आहे.\nगेल्या काही वर्षांपूर्वी स्ट्रॉबेरी कंट्री म्हणून परिचित असलेल्या परिसरात ‘रेड राजबेरी’ ने ‘एन्ट्री’ केली. पण, जे काही उत्पन्न हाती लागत होते, ते अल्पशा प्रमाणात होते. त्याचे दरही आकाशाला गवसणी घालणारे असल्याने उत्पादक शेतकऱ्यांनी स्थानिक बाजारपेठेऐवजी शहरी भागाचा मार्ग स्वीकारला. पण, त्याचा वाहतूक खर्चही अधिक होता. त्याचबरोबर फळही नाशवंत असल्याने रेड राजबेरीने या भागात काही तग धरला नाही.\nभोकरदनमध्ये नदीत शेतकरी गेला वाहून\nकेदारखेडा (जि. जालना) - भोकरदन तालुक्‍यात गुरुवारी (ता. 16) झालेल्या पावसामुळे गिरिजा नदीला मोठ्या...\nपेंग्विनला पाहण्यासाठी चिमुकल्यांची झुंबड\nमुंबई - स्वातंत्र्यदिनी जन्मलेल्या देशातील पहिल्या पेंग्विनला पाहण्यासाठी राणीच्या बागेत शुक्रवारी...\nधडपड - शेतकऱ्यांत विश्‍वास निर्माण करण्याची\nसातारा - शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते, हे दाखवून देण्यासाठी युवकाने शेअर फार्मिंगच्या (गटशेती) माध्यमातून खातवळ येथे ४० एकरांत करार शेती करण्याचे...\nसांस्कृतिक लोकधारांचे संवर्धन गरजेचे - सुप्रिया सुळे\nइंदापूर/ नीरा नरसिंहपूर - ‘लोप पावत चाललेल्या सांस्कृतिक लोकधारांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. यासाठी स्तुत्य उपक्रम अप्पासाहेब जगदाळे यांनी राबविला...\nशेततळी झाली शेती बागायती झाली\nनगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यातील चिंचविहीरे हे संपूर्ण जिरायती गाव. पिण्याचा पाण्याचा प्रश्न इथे नेहमी गंभीर असतो. शेतीत खर्च करणे एवढेच शेतकऱ्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/609523", "date_download": "2018-08-18T10:24:03Z", "digest": "sha1:5BCW74ELIJ4QOLWAMCIHWY7RVDDT7AS6", "length": 5809, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चोरीच्या संशयातून हत्या ; 100 जणांवर गुन्हा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » चोरीच्या संशयातून हत्या ; 100 जणांवर गुन्हा\nचोरीच्या संशयातून हत्या ; 100 जणांवर गुन्हा\nऑनलाईन टीम / मुजफ्फरनगर :\nदेशभरात झुंडबळीच्या घटनांचे प्रमाण वाढले असतानाच, उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिह्यातील बिजोपुरा गावातही जमावानं चोरीच्या संशयातून एका तरुणाची बेदम मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी 100 अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, बिजोपुरा गावातील शेकडोंच्या जमावाने गुरुवारी रात्री चोरीच्या संशयातून कपिल त्यागी या तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानं शेतातील पंप चोरी केल्याचा ग्रामस्थांना संशय होता. शेतमालकाने त्याला पकडले आणि इतर ग्रामस्थांनाही बोलावून घेतले. जमावाने त्याला फरफटत नेले आणि मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्याचवेळी कपिलच्या इतर दोन साथीदारांनी जमावाच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली. जमावाच्या मारहाणीत कपिल गंभीर जखमी झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी तात्काळ कपिलला रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी 100 अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nकाळवीटाचा मृत्यू नैसर्गिक कारणाने : सलमान खान\nमीसा भारतींसह त्यांच्या पतीला आयकर विभागाकडून समन्स\nकर्नाटकात कपडे ठेवण्यासाठी मजुराकडून व्हीव्हीपॅडचा वापर\nपद्मनाभस्वामी मंदिराच्या खजिन्याचे प्रदर्शन नको\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.starfriday2012.com/2018/01/blog-post_16.html", "date_download": "2018-08-18T10:16:02Z", "digest": "sha1:SOTA7XB234HVNSPZVJWKYSYKUUUJ4J7S", "length": 6036, "nlines": 22, "source_domain": "www.starfriday2012.com", "title": "STARFRIDAY : \"कुठलीही कलाकृती आपलं नशीब घेऊन येत असते\" --तेजस्विनी पंडित", "raw_content": "\n\"कुठलीही कलाकृती आपलं नशीब घेऊन येत असते\" --तेजस्विनी पंडित\nमी सिंधू ताई सपकाळ, तू ही रे असे अनेक सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडितला २०१८ च उत्तरार्ध वर्ष खूप अनुकूल ठरलं आहे. २०१८ मध्ये जणू तिच्यावर हिट चित्रपटांचा वर्षाव झाला आहे. त्याचं कारण म्हणजे नुकतेच तेजस्विनी चे दोन चित्रपट प्रदर्शित झालेत. २०१७ च्या अखेरीस तेजस्विनी चा 'देवा' हा चित्रपट रिलीस झाला तर २०१८ च्या सुरुवातीस संजय जाधव दिग्दर्शित 'ये रे ये रे पैसा' हा चित्रपट प्रदर्शित झाला. मुख्य म्हणजे ह्या दोन्ही चित्रपटांनी थिएटर हाऊसफुल केलं. प्रेक्षकांनी ह्या दोन्ही चित्रपटाला छान प्रतिसाद दिला.\nदेवा मध्ये तेजस्विनी लेखिकेच्या भूमिकेतून दिसली. ह्या चित्रपटात पहिल्यांदाच तिने अंकुश चौधरी सोबत काम केलं आहे. चित्रपटात तिने केलेल्या अनोख्या फॅशन बद्दल देखील प्रेक्षकान मध्ये चर्चा रंगली तर 'ये रे ये रे पैसा' मध्ये तेजस्विनी बबली ही भूमिका साकारताना दिसली. सिद्धार्थ जाधव आणि उमेश कामत सोबत तेजस्विनी देखील भाव खाऊन गेली. दिग्दर्शक संजय जाधव ह्यांचासोबत तेजस्विनीचा हा दुसरा सुपरहिट चित्रपट. ह्या दोन्ही चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. 'देवा' आणि 'ये रे ये रे पैसा' असे दोन सुपरहिट चित्रपट देऊन तेजस्विनी भलतीच खुष झाली आहे.\nदोन सुपरहिट चित्रपटांचा हिस्सा झाल्यावर तुझा अनुभव कसा होता ह्याबाबत तिला विचारल्यास ती म्हणाली: \"दोन्ही चित्रपट माझ्या साठी महत्वाचे होते आणि दोन्ही चित्रपटांचं चित्रीकरण करत असताना मला फार मज्जा आली. सेन्सॉर बोर्ड च्या नियंमांमुळे देवा 22 डिसेंबर ला प्रदर्शित करण्यात आला आणि येरे येरे पैसा ५ जानेवारी ला प्रदर्शित केला. दोन्ही चित्रपटांच्या तारखान मध्ये काही दिवसांचाच वेळ असल्यामुळे माझी धावपळ होत होती पण दोन्ही चित्रपटांची टीम सपोर्टटिंग होती म्हणून मला बॅलन्स करता आलं. तसंच 'येरे येरे पैसा' मध्ये बरेच कलाकार असल्यामुळे प्रमोशन करायला ते सोप्प जात होतं. मी जेव्हा एखादा चित्रपट करते किंवा एखादं काम करते, त्याचा पुढे काय परिणाम होईल तो कितीपट चालेल हे गृहीत धरून त्या चित्रपटासाठी काम करत नाही. हो ह्याबाबत तिला विचारल्यास ती म्हणाली: \"दोन्ही चित्रपट माझ्या साठी महत्वाचे होते आणि दोन्ही चित्रपटांचं चित्रीकरण करत असताना मला फार मज्जा आली. सेन्सॉर बोर्ड च्या नियंमांमुळे देवा 22 डिसेंबर ला प्रदर्शित करण्यात आला आणि येरे येरे पैसा ५ जानेवारी ला प्रदर्शित केला. दोन्ही चित्रपटांच्या तारखान मध्ये काही दिवसांचाच वेळ असल्यामुळे माझी धावपळ होत होती पण दोन्ही चित्रपटांची टीम सपोर्टटिंग होती म्हणून मला बॅलन्स करता आलं. तसंच 'येरे येरे पैसा' मध्ये बरेच कलाकार असल्यामुळे प्रमोशन करायला ते सोप्प जात होतं. मी जेव्हा एखादा चित्रपट करते किंवा एखादं काम करते, त्याचा पुढे काय परिणाम होईल तो कितीपट चालेल हे गृहीत धरून त्या चित्रपटासाठी काम करत नाही. हो पण निश्चितपणे अपेक्षा असतात. हा चित्रपट कमी धंदा करेल म्हणून मी माझं काम १००% देणार नाही असं गृहीत न धरता कुठल्याही प्रोजेक्ट मध्ये मी त्या चित्रपटाचा १००% भाग होण्याचा प्रयत्न करत असते कारण कुठलीही कलाकृती आपलं नशीब घेऊन येत असते.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/banks-will-take-action-against-three-big-companies-54754", "date_download": "2018-08-18T10:46:07Z", "digest": "sha1:RGKJ3YLKD6RIQHAAQJ5J257D5KXJWEF3", "length": 12939, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Banks will take action against three big companies तीन बड्या कंपन्यांविरोधात बँकांच्या कारवाईचा बडगा | eSakal", "raw_content": "\nतीन बड्या कंपन्यांविरोधात बँकांच्या कारवाईचा बडगा\nशुक्रवार, 23 जून 2017\nमुंबई: भूषण स्टील, एस्सार स्टील आणि इलेक्ट्रोस्टील स्टील्स या तीन मोठ्या कंपन्यांविरुद्ध दिवाळखोरी कायद्यांतर्गत कारवाईची प्रक्रिया लवकरच सुरु होणार असून, यासाठी भारतीय स्टेट बँकेच्या(एसबीआय) नेतृत्वाखाली हे प्रकरण कंपनी कायदा लवादापुढे(एनसीएलटी) मांडले जाणार आहे.\nमुंबई: भूषण स्टील, एस्सार स्टील आणि इलेक्ट्रोस्टील स्टील्स या तीन मोठ्या कंपन्यांविरुद्ध दिवाळखोरी कायद्यांतर्गत कारवाईची प्रक्रिया लवकरच सुरु होणार असून, यासाठी भारतीय स्टेट बँकेच्या(एसबीआय) नेतृत्वाखाली हे प्रकरण कंपनी कायदा लवादापुढे(एनसीएलटी) मांडले जाणार आहे.\nएसबीआयच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मॅरेथॉन बैठकीत हा निर्णय झाला. भूषण स्टीलने बँकांचे तब्बल 44,478 कोटी रुपये कर्ज थकविले असून एस्सार स्टीलचा आकडा सुमारे 37,284 कोटी रुपयेएवढे आहे. त्याचप्रमाणे, इलेक्ट्रोस्टील स्टील्सच्या थकीत कर्जाचा आकडा 10,273 कोटी रुपये आहे. गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने 25 टक्क्यांपेक्षा अधिक कर्ज थकविणाऱ्या 12 कंपन्यांची नावे समोर आणली होती.\nभूषण पॉवर अँड स्टीलबाबत कर्ज घेण्यासाठी आता आयडीबीआय बँकेच्या नेतृत्वाखाली बँकांची बैठक होणार आहे. कंपनीचे 37,248 कोटी रुपयांचे कर्ज थकित आहे.\nरिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या यादीत अॅमटेक ऑटो (14,074 कोटी रुपये), आलोक इंडस्ट्रीज(22,075 कोटी रुपये), मॉनेट इस्पात (12,115 कोटी रुपये) आणि लँको इन्फ्राचा समावेश आहे.(44,364.6 कोटी रुपये) याशिवाय, एरा इन्फ्रा(10,065.4 कोटी रुपये), जयपी इन्फ्राटेक(9,635 कोटी रुपये), एबीजी शिपयार्ड(6,953 कोटी रुपये) आणि ज्योती स्ट्रक्चर्सची(5,165 कोटी रुपये) कर्जे मोठ्या प्रमाणावर थकीत आहेत.\nकंपनी कायदा लवादासमोर(एनसीएलटी) हा खटला सुरु झाल्यानंतर बँकांना आपला वकील निवडण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी मिळणार आहे. त्यानंतर कर्जबुडव्या कंपनीला 180 दिवसांच्या आता कर्जफेडीची योजना जाहीर करावी लागेल. काही अपवादात्मक परिस्थितीत कंपनीला ही योजना जाहीर करण्यासाठी 270 दिवसांचा कालावधी दिला जाईल. दिलेल्या कालावधीत कर्जाची परतफेड न केल्यास मात्र कंपनीची मालमत्ता विकण्यात येणार आहे.\nअथणीत दोन शेतकऱ्यांची आत्महत्या\nअथणी - कर्जाला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अथणी तालुक्‍यातील हुलगबाळी आणि हल्याळ येथे घडली. संजय बसय्या मठद (वय ४५, रा...\nस्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण निवडणुकीच्या भाषणासारखे झाल्याने त्याची दखल घेणे आवश्‍यक आहे. आपण पंतप्रधान झाल्यानंतरच सारे काही...\nलोहोणेरच्या शेतकऱ्यास कर्जासाठी 18 लाखांना फसविणारे दोघे गजाआड\nनाशिक - लोहोणेर (ता. देवळा) येथील शेतकऱ्यास पाच कोटी कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून साडेअठरा लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघा संशयितांना गंगापूर...\nएटीएम फोडणाऱ्या हायटेक चोरट्यास अटक\nनागपूर - गॅस कटरच्या मदतीने तीन एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न करणारा लक्ष्मण सुभाष जयसिंगपुरे (24, मानबस्ती ले-आउट, कळमना) या चोरट्यास लकडगंज...\nवाजपेयींच्या भाषणांनी मंतरलेली सांगली\n...हे माझे भाग्यच १९५७ च्या दरम्यान विलिंग्डन महाविद्यालयाच्या पटांगणात वाजपेयींची विद्यार्थी नेता म्हणून जाहीर सभा झाली होती. संघाचे बाबा पोतदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/american-president-donald-trump-use-dirty-language-for-african-nations-1616386/", "date_download": "2018-08-18T11:11:28Z", "digest": "sha1:7VZETC6GBWRV77NG7DFBZAUE4CRKAHRG", "length": 15867, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "American president donald trump use dirty language for African nations | | Loksatta", "raw_content": "\nबेशिस्त वाहनचालकांना ९१ लाखांचा दंड\nपक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा\nपुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित\nजळगावमध्ये महाजन-खडसे गटबाजीची सर्वत्र बाधा\nएमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल\nअमेरिकेतील स्थलांतर-नियमांमध्ये ट्रम्प प्रशासनाने सुचविलेले बहुतेक बदल सध्या फेटाळले गेले आहेत.\nसंयम हे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे पहिले पथ्य, तर संभाव्य प्रतिक्रिया जोखून मगच उक्ती वा कृती करण्याचा मुरब्बीपणा हे दुसरे. ही दोन्ही पथ्ये पाळली नाहीत तर पाऊल मागे घेण्याची नामुष्की तरी येते किंवा मुत्सद्देगिरीतील पत तरी खालावते. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण या पथ्यांपासून किती दूर आहोत, हे गेल्या काही दिवसांत पुन्हा दाखवून दिले. राष्ट्राध्यक्षपदाला अत्यंत विशोभित अशा भाषेत हैती वा एल साल्वादोरसारख्या सागरी देशांचा जाहीर उल्लेख केल्याबद्दल ट्रम्प यांच्यावर जगभरातून टीका होते आहेच. या देशांची तुलना ट्रम्प यांनी शौचालयांशी केली आणि तेथील लोकांनी अमेरिकेत स्थलांतरित होऊ नये असे सुचविले. अर्थात, अमेरिकेतील स्थलांतर-नियमांमध्ये ट्रम्प प्रशासनाने सुचविलेले बहुतेक बदल सध्या फेटाळले गेले आहेत. मात्र गलिच्छ भाषेबद्दल अमेरिकी अध्यक्षांच्या निषेधाचा सूर जगभरातून उमटला. तरीही ‘व्हाइट हाऊसच्या स्थलांतर धोरणात बदल नाही’ वगैरे खुलासे सुरूच राहिले. ‘अमेरिकेला पुन्हा महान करू’ या आश्वासनानिशी सत्तेवर आलेल्या ट्रम्प यांची दुसरी राजनैतिक उलाढाल याहून गंभीर आहे. इराणसारख्या देशाला काबूत ठेवण्यासाठी ट्रम्प यांचे पूर्वसुरी बराक ओबामा यांनी केलेला इराण-अमेरिका अणुकरार ट्रम्प यांना मान्य नाही. इराणमध्ये गेला महिनाभर इराणी नागरिकांचे नेतृत्वहीन जथे विरुद्ध त्या देशाचे विद्यमान अध्यक्ष हसन रूहानी यांचे समर्थक अशा दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी मोर्चे, निदर्शने सुरू आहेत. याचा अर्थ लोकशाहीवादी इराणी नागरिक तेथील राजवटीला नव्हे तर अमेरिकेला पाठिंबा देत आहेत, असे ट्रम्प प्रशासनाला वाटते. तसा प्रचारही फॉक्स न्यूज आदी ट्रम्पसमर्थक प्रसारमाध्यमांनी सुरू ठेवला आहे. मात्र हे इराणी मोर्चेकरी लोकशाहीवादीच आहेत असे म्हणता येणार नाही, जेथे बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे तेथेच मोर्चे-निदर्शनांना अधिक पाठिंबा मिळत आहे, असा सावधगिरीचा सूर ‘वॉशिंग्टन पोस्ट’सारख्या जबाबदार दैनिकाने दिला आहे. जबाबदार प्रसारमाध्यमांचे कधीही न ऐकता स्वत:चेच घोडे दामटणे, हे हुकूमशाही वृत्तीचे महत्त्वाचे लक्षण. ते ट्रम्प यांच्या अनेक कृतींतून पुरेपूर दिसले असून इराणवरील फेर-र्निबधांचा आग्रहदेखील त्यास अपवाद नाही. असे निर्बंध लादण्याच्या कृतीपायी गेल्याच आठवडय़ात संयुक्त राष्ट्रांत ट्रम्प प्रशासनाची निंदा झाली. रशियाने या निषेधात आघाडी घेऊन इराणमधील रशियन गुंतवणूक वाढणारच, हे सूचित केले. तर चीनने शनिवारपासून या र्निबधांविरुद्ध जागतिक आघाडीचे नेतेपद स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. भारताचा इराणशी व्यापार निर्बंध असतानाच्या काळातही अबाधित होता. डॉलरऐवजी आपापले चलन भरायचे आणि चलन-विनिमय प्रत्यक्षात करणे टाळून इराणी तेलाएवढय़ाच किमतीच्या वस्तू आपण त्या देशाला विकायच्या, असे तंत्र मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात विकसित झाले. इराणवरील अमेरिकी निर्बंधांपासून आपण तेव्हा अलिप्त राहू शकलो, तसे आताही राहू शकतोच. परंतु प्रश्न ट्रम्पनीतीमुळे भारताच्या आर्थिक वा व्यावहारिक नुकसानाचा नसून या नीतीतील अंगभूत दोष ओळखून आपली अमेरिकाविषयक धोरणे आपण ठरविण्याचा आहे. ट्रम्प यांचे राजकारण अभिमानकेंद्री, गर्वकेंद्री आहे. हे अंगभूत अपंगत्व- किंवा दिव्यांगत्व- वारंवार नवनव्या वादांना निमंत्रण देत राहणारच.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n पिंपरीत पित्याने दोन मुलांची हत्या करुन केली आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nIt's Official: नात्यावर शिक्कामोर्तब करत अखेर निक-प्रियांका म्हणाले....\nसहजीवनाचा पहिला टप्पा सर, थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा\nइम्रान खानच्या शपथविधीला सिद्धूंना मानाचे स्थान, घेतली लष्करप्रमुखांची गळाभेट\nमिनी एसयुव्हीसारखं डिझाईन असलेली नवीन रेनाँ क्विड वसूल करते तुमचा पै न पै\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nअंतर्गत वाहतुकीसाठी ट्रामचा पर्याय\nवाहनांना एक टोल माफ\nरेल्वेचे संगणकीय आरक्षण केंद्र पावणेतीन तास बंद राहणार\nस्वानंद देणारे शिक्षण निवडा\nवामनदादा कर्डकांना शाहिरीतून अभिवादन\nभूगावमधील हॉटेलमध्ये कोंबडय़ांच्या झुंजीवर जुगार\nपाणी पुरेना आणि म्हणे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/tag/?tagname=Marathi%20Rajbhasha%20Din%202018", "date_download": "2018-08-18T11:17:32Z", "digest": "sha1:ZGUORUVCJYLT5W35I5CLHVCUWZXUWIS4", "length": 3647, "nlines": 102, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\n‘आयुष्मान भारत’अंतर्गत १० हजार नोकऱ्यांची संधी\nकंपन्यांचे तिमाही निकाल शेअर खरेदीला अनुकूल\nडॉ. राजेंद्रसिंह, विशाल भारद्वाज, ल्युसिल बॉल\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\n१२ ते १८ ऑगस्टदरम्यान रत्नागिरीत कीर्तन सप्ताह\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7/", "date_download": "2018-08-18T10:59:30Z", "digest": "sha1:3IJ457UFGFUOAZELPAMZG43JJSNIIAC2", "length": 16711, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "सरकारने विधानपरिषदेत घोषणा केल्यास त्वरीत आंदोलन मागे घेऊ- राजू शेट्टी - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे…\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची…\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Maharashtra सरकारने विधानपरिषदेत घोषणा केल्यास त्वरीत आंदोलन मागे घेऊ- राजू शेट्टी\nसरकारने विधानपरिषदेत घोषणा केल्यास त्वरीत आंदोलन मागे घेऊ- राजू शेट्टी\nमुंबई, दि. १६ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतल्याची टीका, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली. सरकारने जर आज विधानपरिषदेत शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ रूपये अनुदान जमा करण्याची घोषणा केली तर आम्ही आजच आंदोलन मागे घेऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.\nमुख्यमंत्र्यांनी आम्हाला चर्चेसाठी कधीच बोलावले नाही. त्यांनी निमंत्रण कधी दिले होते, असा सवाल करत मी कधी नकार दिला हे त्यांनी जाहीर करावे. चर्चेला आम्हाला बोलावले असेल तर त्यांनी पुरावे जाहीर करावेत, असे आव्हानही त्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी नेहमी तयार असल्याचे ते म्हणाले.\nसरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात दूध माफिया तयार झाले असून त्यांनी ५३ कोटींवर डल्ला मारल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. दुधाचा धंदा हा तोट्याचा आहे. शेतकऱ्यांनी किती दिवस हे सहन करायचे. सरकारच्या आडमुठेपणामुळे शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. आंदोलन आम्ही रात्री १२ वाजता सुरू करणार होतो. पण पोलिसांनी सरकारच्या आदेशावरून कार्यकर्त्यांना रविवारी ताब्यात घेण्यास सुरूवात केली. कार्यकर्त्यांच्या घरी महिलांना शिवीगाळ केली. त्यामुळे राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. कार्यकर्त्यांनी दूध कमी प्रमाणात सांडले आहे. शेतकऱ्यांना दोष देऊ नका. त्यांनी विद्यार्थी, गोरगरीब आणि वारकऱ्यांना मोफत दूध वाटण्यात आले आहे. ९० टक्के दूध चांगल्या कामासाठी वापरले आहे.\nPrevious articleपुणे-मुंबई महामार्गावरील कार्ला फाट्याजवळ दोन कारमधील भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू; तिघांची प्रकृती गंभीर\nNext articleफ्रान्सचा क्रोएशियावर ४-२ ने विजय; २० वर्षानंतर जगज्जेतेपद पटकावले\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घाेषणा\nहिम्मत होती तर एकेकाने यायचे होते मग दाखवले असते; औरंगाबादेतील एमआयएम नगरसेवकाचा माज\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nशिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; माजी महापौर दत्ता दळवींचा फोन टॅप\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nफेसबुकवर बदनामी केल्याप्रकरणी सुप्रिया सुळेंची पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार\nहिंजवडीत विद्यार्थिनीचा विनयभंग; आरोपी अटक\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nभाजपची साथ सोडल्यास शिवसेनेशी युती करण्याचा विचार – राजू शेट्टी\nराजकीय जीवनाच्या सुरुवातीपासूनच मी पवारांचा चाहता – व्यंकय्या नायडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/home/videos", "date_download": "2018-08-18T10:24:24Z", "digest": "sha1:MEGE67S7TL6WFWQNW5D7NIHY3TQ3S5VP", "length": 2729, "nlines": 24, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "videos - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nश्रावणातील पहिल्या शुक्रवारी शहरातील मंदिरात पूजा | Belgaum News |17-08-2018\nदुधगंगा नदी पात्रा बाहेर | Belgaum News |17-08-2018\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nकॉर्पोरेट जगतातील प्रत्येक मध्यमवर्गीय घरातील, अक्षय आणि प्रणोतीची गोष्ट सांगणारे, डोण्ट वरी … Full article\nमराठी मनोरंजन क्षेत्रात ‘एसपीएन’ चे पहिले पाऊल\nऑनलाईन टीम / मुंबई : Sony मराठी ह्या नवीन वाहिनीच्या माध्यमातून Sony …\nनासाची ऐतिहासिक ‘उड्डान’ 24 तासांनी लांबले\nऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : चंद्र, मंगळावर स्वाऱया केल्यानंतर नासा ही संस्था … Full article\nगुगलकडून क्रिकेटपटू दिलीप सरदेसाईंना मानवंदना\nऑनलाईन टीम / मुंबई : भारताचे महान क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांच्या 78व्या …\n‘रेनो’नं लॉन्च केली नवी Kwid\nऑनलाईन टीम / मुंबई : भारतात एन्ट्री लेवल हॅचबॅक सेगमेंटमध्ये ‘क्विड’च्या अतिशय … Full article\nयमाहाची नवीन स्कूटर लॉंच\nऑनलाईन टीम / मुंबई : दुचाकींच्या नवनवीन मॉडेलमुळे ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्र बनलेल्या …\n़….. म्हंजे म्हंजे ते टीवीतल्या सिरीयलमध्ये असते ते \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/ureka-article-saptarang-53354", "date_download": "2018-08-18T10:30:11Z", "digest": "sha1:Q4XEVIE6BR66NNPCJBXM3TXI4QGEWJ26", "length": 28084, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "ureka article in saptarang क्षण ‘युरेका’चा | eSakal", "raw_content": "\nरविवार, 18 जून 2017\nकाही वर्षांपूर्वी आमच्या शाळेत सर्व विद्यार्थ्यांचं आणि गावातल्या इतर लोकांसाठी आधार कार्ड काढण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. शाळेतल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून त्यांना रांगेत उभं केलं होतं.\nकाही वर्षांपूर्वी आमच्या शाळेत सर्व विद्यार्थ्यांचं आणि गावातल्या इतर लोकांसाठी आधार कार्ड काढण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. शाळेतल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून त्यांना रांगेत उभं केलं होतं.\nमी माझ्या ऑफिसमधून एका वर्गाला भेट देण्यासाठी चालले होते. त्यावेळी आधार कार्ड नोंदणीचे फॉर्म घेण्यासाठी गावातल्या स्त्री-पुरुषांची रांग लागली होती. रांग बरीच मोठी होती. त्या रांगेत हातात काठी घेतलेल्या आणि कमरेत वाकलेल्या वयस्कर आजी मला दिसल्या. त्यांचा रांगेतला नंबर पाहिल्यावर त्यांचा नंबर येण्यास खूप वेळ लागेल, असं मला दिसून आलं. मग मी त्या वर्गात न जाता आजींच्या जवळ गेले. ‘‘आजी, तुम्ही जरा माझ्या ऑफिसमध्ये येता का माझं तुमच्याकडं छोटंसं काम आहे,’’ असं म्हणून मी आजींना माझ्याबरोबर येण्यास सांगितलं. आजी माझ्यामागं काठी टेकत-टेकत पायऱ्या चढून माझ्या ऑफिसमध्ये आल्या, तेव्हा मी त्यांना बसण्यास खुर्ची दिली आणि त्या खुर्चीवर बसल्यावर त्यांना पिण्यास पाणी दिलं. पाणी पिऊन झाल्यावर आजी म्हणाल्या, ‘‘मॅडम, लवकर सांगा- तुमचं माझ्याकडं काय काम आहे माझं तुमच्याकडं छोटंसं काम आहे,’’ असं म्हणून मी आजींना माझ्याबरोबर येण्यास सांगितलं. आजी माझ्यामागं काठी टेकत-टेकत पायऱ्या चढून माझ्या ऑफिसमध्ये आल्या, तेव्हा मी त्यांना बसण्यास खुर्ची दिली आणि त्या खुर्चीवर बसल्यावर त्यांना पिण्यास पाणी दिलं. पाणी पिऊन झाल्यावर आजी म्हणाल्या, ‘‘मॅडम, लवकर सांगा- तुमचं माझ्याकडं काय काम आहे माझा रांगेतला नंबर येऊन जाईल. या सरकारनं काय फतवा काढलाय, आता या वयात मला रांगेत उभं राहायला व्हतंय का माझा रांगेतला नंबर येऊन जाईल. या सरकारनं काय फतवा काढलाय, आता या वयात मला रांगेत उभं राहायला व्हतंय का\nतेव्हा मी त्यांना म्हणाले, ‘‘आजी, तुम्ही माझ्या आजीसारख्याच आहात. तुम्हाला रांगेत उभं राहायला नको, म्हणून तर मी तुम्हाला इथं बोलावलं आहे.’’ त्यानंतर मी माझ्याकडच्या फॉर्मवर त्यांची माहिती विचारून भरून घेतली आणि त्यावर त्यांचा अंगठा घेतला. आजींना बरोबर घेऊन मी आधारकार्ड काढण्यासाठीच्या ठिकाणी घेऊन गेले आणि त्या साहेबांना सांगून आजींचं काम पहिलं करून घेतलं.\nत्यावेळी आजींच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि समाधान पाहून मला ‘युरेका’ सापडल्याचा आनंद झाला. नंतर मी समाधानानं माझ्या ऑफिसमध्ये जाऊन बसले. माझ्यामागं लगेचच त्या आजी काठी टेकत-टेकत ऑफिसमध्ये आल्या आणि मला हात जोडून म्हणाल्या, ‘‘मॅडम, आज लय भारी काम केलं तुम्ही माझं.’’ त्यावेळी आजींच्या चेहऱ्यावर त्यांचं काम पूर्ण झाल्याचा जो आनंद दिसला, तो मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.\nनंतर मी शाळेत जाताना त्या आजी मला ज्या-ज्या वेळी भेटतात, तेव्हा मला आवाज देऊन थांबवतात आणि माझी मायेनं विचारपूस करतात. ‘‘मॅडम तुम्ही त्या दिवशी माझं लय भारी काम केलं. तुमच्यामुळं मला आधार कार्ड लवकर मिळालं,’’ असं नेहमी म्हणतात. त्यांची ही कृतज्ञतेची भावना पाहून मला एक वेगळी प्रेरणा मिळाली. तेव्हापासून मी मूर्तीतल्या देवाची पूजा न करता गोरगरिबांना आणि गरजूंना मदत करणं, अडचणीत असणाऱ्यांच्या मदतीस धावून जाणं आणि वयस्कर लोकांची सेवा करणं याची मला सवयच लागली. त्यामुळं केलेल्या सेवेचा आणि मदतीचा आनंद यामुळं जे आत्मिक समाधान मिळतं ते लाखमोलाचं आहे.\n- अश्‍विनी साळवी, पुरंदर, जि. पुणे.\n‘मिस्टर बीन’नं दिली लिफ्टची कल्पना\nपा लकांची सतत ओरड असते, की चित्रपट बघण्यापेक्षा पुस्तकं वाचा; पण बऱ्याच वेळा या चित्रपटांमधून आपल्याला शिकायलाही मिळत असतं. मी नुकताच ‘मिस्टर बीन्स हॉलिडे’ हा चित्रपट पाहिला. त्यात मिस्टर बीन महामार्गावर उभा असतो आणि शहराकडं जाण्यासाठी त्याला ‘लिफ्ट’ हवी असते, तेव्हा तो उजवा हात पुढं करून आणि अंगठा वर करून उभा राहतो. थोड्याच वेळात त्याच्यासाठी एक गाडी थांबते, असं दृश्‍य होतं. मला किंचित आश्‍चर्य वाटलं. लिफ्ट मागण्याची ही पद्धत मला तर नव्यानंच कळली.\nत्यानंतरची गोष्ट. कुठल्याशा व्याख्यानाला गेलो होतो. व्याख्यान संपायला बराच उशीर झाला. जवळपास रात्रीचे साडेनऊ वाजून गेले. बसस्टॉपवर पोचल्यावर कळलं, की शेवटची बस नुकतीच निघून गेली. ती थोडी निर्मनुष्य वस्ती असल्यानं रिक्षाही पटकन्‌ मिळेनात. काय करावं याचा विचार करत मी तिथंच थांबलो. मला लांबून एक कार येताना दिसली. अचानक मला ‘मिस्टर बीन’ चित्रपटातलं ते लिफ्ट मागण्याचं दृश्‍य आठवलं. मी लगेच उजवा हात पुढं करून अंगठा वर करून उभा राहिलो; पण तो गाडीवान काही थांबला नाही. मला आणखी एक गाडी येताना दिसली. आश्‍चर्य म्हणजे यावेळी गाडी थांबली. त्यातल्या चालकानं मला ‘कुठं जाणार’ म्हणून विचारलं. त्यानं मला जवळच्या बसस्टॉपवर सोडलं. तिथून मला घरी पोचता आलं. मनातल्या मनात मी ‘मिस्टर बीन’चे आभार मानले.\n- आदित्य जवळकर, पुणे\nए का सामाजिक संस्थेचं आम्ही काम करतो. संस्थेच्या वतीनं अनेक उपक्रमांचं आयोजन केलं जातं. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या उपक्रमांची जबाबदारी माझ्यावर आहे. गेली २४ वर्षं सातत्यानं निरनिराळे उपक्रम यशस्वी होत आहेत. सुरवातीच्या काळात कार्यक्रमांत काही गोष्टींची कमतरता भासायची. कधी पारितोषिकांची संख्या कमी यायची, तर कधी प्रशस्तिपत्रकावर मान्यवरांच्या सह्या घ्यायच्या राहिलेल्या असायच्या. कधी एखादा निरोप ठराविक व्यक्तींना दिला गेला नसायचा. कार्यक्रम पार पडायचा; पण तो सुरळीत आणि यशस्वी न झाल्याची खंत असायची. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी काय करायला पाहिजे यावर विचार केला, तेव्हा लक्षात आलं, की कोणताही कार्यक्रम ठरवताना त्याची तारीख, वेळ, ठिकाण, सहभागी होणाऱ्या व्यक्ती, सहकार्य करणाऱ्या व्यक्ती, अर्थसाह्य करणारे देणगीदार, जमा-खर्चाचं अंदाजपत्रक, त्यासाठी होणाऱ्या मीटिंग्ज, कामाची जबाबदारी आपण ज्यांच्यावर सोपवणार आहोत त्या व्यक्ती. सर्व कामांची नोंद आणि कार्यक्रमानंतर सर्वांना वैयक्तिक धन्यवाद देणं या गोष्टींचं नियोजन केलं पाहिजे. हे सर्व केल्यानं प्रत्येक उपक्रम यशस्वी होऊ लागला. कामाचा आनंद मिळाला. म्हणजे व्यवस्थित नियोजनानं आयोजन यशस्वी होतं. अशातच राज मुछाल यांनी दिलेला सल्ला मला उपयोगी पडला. तो म्हणजे ‘हे मी करते- हा माझा कार्यक्रम आहे,’ असं न म्हणता ‘हे आपण करतो- हा आपला कार्यक्रम आहे,’ असं म्हटलं पाहिजे. मी आणि माझं नव्हे, तर ‘आपण’ आणि ‘आपले’ अशी भूमिका घेतली, तर उपक्रम यशस्वी होतात. आजपर्यंत अशा उपक्रमांचा आनंद आम्ही घेत आहोत. ‘मी’ आणि ‘माझे’ यांच्यामध्ये ‘ग’ची बाधा सुरू होते. सहकारी मित्रांमध्ये उगीचच असंतोष पसरतो. सर्वांच्या आवडीनिवडीचा विचार करून कामाची विभागणी केली, प्रत्येकाला कामाची जबाबदारी दिली, तर थोडी जबाबदारी पार पाडणाऱ्यालासुद्धा त्याचा आनंद मिळतो. सर्वांनी मिळून केलेलं असं काम यशस्वीरित्या पूर्ण होतं. ही ‘आपले’पणाची पद्धत वापरली, तर कोणताही कार्यक्रम परिपूर्ण होतो.\n- सीमा दाबके, पुणे\nशा सकीय सेवेत असताना माझी बदली उस्मानाबादला झाली होती. मुलांच्या शिक्षणासाठी कुटुंब पुण्याला ठेवून मी ‘अप-डाऊन’ करत असे. आठवड्याला साधारण रविवारी माझी पुण्याला चक्कर ठरलेली असायची.\nएसटीनं प्रवास करणं मला आवडतं. गाडी बंद पडली, तर पर्यायी एसटीमध्ये बसवलं जातं, हे त्याचं एक कारण आणि ‘सुरक्षितता’ हे दुसरं कारण.\nसाधारण १७ वर्षांपूर्वीची गोष्ट. उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारी चार वाजता पुण्याहून उस्मानाबादला जाण्यासाठी बसमध्ये बसलो. चार वाजले, तरी उन्हाचा चटका कमी नव्हता. खिडकीजवळची जागा मोठ्या प्रयासानं मिळवली होती. खिडकीतून आलेलं ऊन चेहऱ्यावर पडत होतं. ते सहन होत नव्हतं. माझ्या शेजारी बसलेल्या गृहस्थाच्या ते लक्षात आलं. त्यांनी स्वतःच्या पिशवीत असलेली लुंगी देऊन खिडकीत अडकवायला सांगितली. तसं केलं. उन्हाच्या ठिकाणी सावली आली. शेजाऱ्याचे आभार मानले.\nरात्री नऊच्या सुमाराला एसटी बार्शी-उस्मानाबाद रस्त्यावर बंद पडली. गाडीच्या इंजिनात दोष निघाल्यामुळं दुरुस्तीची शक्‍यता कमी होती. दुसऱ्या एसटीची वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. एक तास झाला. अंधारी रात्र. पोटात कावळे ओरडू लागले. आमच्या पुढच्या खिडकीशेजारी बसलेलं एक लहान मूल पाणी मागू लागलं. त्याला भूकही लागली असावी. माझ्या शेजारचे गृहस्थ तयारच होते. त्यांनी स्वतःकडचं पाणी त्या मुलाला दिलं. स्वतःकडची शिदोरी सोडली. मुलानं थोडं खाऊनही घेतलं. आता तो चांगला खेळू लागला. दरम्यान, दुसरी एसटी उपलब्ध झाली. मी शेजाऱ्याला विचारलं ः ‘‘तुमच्याकडं या सर्व वस्तू कशा काय असतात\n‘‘मी नेहमी प्रवास करतो. शिदोरी, पाणी, लुंगी, छत्री नेहमी मी जवळ ठेवतो. आणीबाणीच्या काळात या वस्तू कधी उपयोगी पडतील, हे सांगता येत नाही. शिदोरीमुळं कुठंही आपल्या घरचं अन्न मिळतं. हॉटेलपेक्षा केव्हाही चांगलं. आपल्याजवळ असलेलं घरचं पाणी केव्हाही पिता येतं. बिसलेरी बाटलीतल्या पाण्याचा भरवसा नाही. लुंगीचा उपयोग अंथरूण-पांघरूण, मफलर, टॉवेल कसाही करता येतो. छत्रीचा उपयोग उन्हात-पावसात होतो. उन्हाळ्यात कधीही पाऊस येतो.’’\nत्या दिवसापासून मी प्रवासाला जाताना शिदोरी-पाणी-लुंगी-छत्री आठवणीनं बरोबर घेतो.\n- शिवलिंग राजमाने, पुणे\n'एक धागा शौर्य' का सैनिकांसाठी जुन्नरच्या विद्यार्थ्यांनीचा अभिनव उपक्रम\nजुन्नर - सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांसाठी जुन्नरच्या शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थिनींनी 'एक धागा शौर्य'का हा अभिनव...\nटाकवे बुद्रुक - सावित्रींच्या लेकींना दुस-या टप्प्यात पंधरा सायकलींचे वाटप\nटाकवे बुद्रुक - आंदर मावळाच्या मिंडेवाडी तील ठाकरवस्ती, चावसरवस्ती, जाधववाडीतून पायपीट करीत येणा-या विद्यार्थ्यांसह सावित्रींच्या लेकींना दुस-या...\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nसंग्रामपूर : वाण धरण ६५ टक्के भरले\nसंग्रामपूर : सातपुडा पर्वतामधील तीन जिल्ह्यांसाठी जलसंजीवनी ठरलेले वाण धरण 65 टक्के भरले आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या ...\nबारामती - विद्या प्रतिष्ठानच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पुरस्कार\nबारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/aurangabad-court-stone-pelting-imran-mehendi-1623607/", "date_download": "2018-08-18T11:12:35Z", "digest": "sha1:7RWI5BF5MHWPVEJ22QLYCVB4RE4ESP7D", "length": 10987, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Aurangabad court stone pelting imran mehendi | औरंगबाद जिल्हा सत्र न्यायालयात दगडफेक | Loksatta", "raw_content": "\nबेशिस्त वाहनचालकांना ९१ लाखांचा दंड\nपक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा\nपुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित\nजळगावमध्ये महाजन-खडसे गटबाजीची सर्वत्र बाधा\nएमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल\nऔरंगाबाद सत्र न्यायालयात दगडफेक\nऔरंगाबाद सत्र न्यायालयात दगडफेक\nखुनाच्या आरोपाखाली कोठडीत असलेला कुख्यात सुपारी किलर इम्रान मेहंदी याला पोलिसांनी आज औरंगबाद जिल्हा सत्र न्यायालयात आणले. यावेळी अज्ञात गटाने त्याच्यावर तुफान दगडफेक केली. जमावाने केलेल्या दगडफेकीत तीन जण जखमी झाले आहेत. अचानक दगडफेक व्हायला लागल्याने न्यायालयात भर गर्दीच्या वेळी एकच धावाधाव झाली. विशेष म्हणजे ही सर्व घटना उपस्थितांच्या कॅमेरात कैद झाली आहे.\nसुपारी किलर अशी ओळख असलेला कुख्यात आरोपी इम्रान मेहंदीवर अनेक नागरिकांच्या हत्येचा आरोप आहे. नगरसेवक सलीम कुरेशी हत्याकांडमध्येही मेहंदी प्रमुख आरोपी होता. कोठडीत असलेल्या मेहंदीला याच प्रकरणात आज न्यायालयात आणले. मात्र त्यापूर्वीच कुरेशी गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात न्यायालयात आले होते. मेहंदीला पाहताच त्यामधील काही जणांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावरून वाद उफाळला आणि काही क्षणात याठिकाणी दगडफेक सुरु झाली. दगडफेकीत 3 जण जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांची अधिक कुमक न्यायालयात मागविण्यात आली. या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेतले असून नेमकी कोणावर कारवाई करण्यात आली याबाबत माहिती मिळू शकली नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n पिंपरीत पित्याने दोन मुलांची हत्या करुन केली आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nIt's Official: नात्यावर शिक्कामोर्तब करत अखेर निक-प्रियांका म्हणाले....\nसहजीवनाचा पहिला टप्पा सर, थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा\nइम्रान खानच्या शपथविधीला सिद्धूंना मानाचे स्थान, घेतली लष्करप्रमुखांची गळाभेट\nमिनी एसयुव्हीसारखं डिझाईन असलेली नवीन रेनाँ क्विड वसूल करते तुमचा पै न पै\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nअंतर्गत वाहतुकीसाठी ट्रामचा पर्याय\nवाहनांना एक टोल माफ\nरेल्वेचे संगणकीय आरक्षण केंद्र पावणेतीन तास बंद राहणार\nस्वानंद देणारे शिक्षण निवडा\nवामनदादा कर्डकांना शाहिरीतून अभिवादन\nभूगावमधील हॉटेलमध्ये कोंबडय़ांच्या झुंजीवर जुगार\nपाणी पुरेना आणि म्हणे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%87/", "date_download": "2018-08-18T10:52:18Z", "digest": "sha1:JEM5L6VS2OED2M6B457PS4ZMKXYPJSFM", "length": 8151, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "के. चंद्रशेखर राव यांनी घेतली देवेगौडांची भेट | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nके. चंद्रशेखर राव यांनी घेतली देवेगौडांची भेट\nबंगळुरु : राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडलेले आणि आंध्र प्रदेशाला विशेष दर्जा मिळावा यासाठी तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडूंनी भाजपाविरोधात मोर्चा उघडल्यानंतर तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीही तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न चालवले आहेत. राव यांनी माजी पंतप्रधान आणि जनता दल धर्मनिरपेक्षचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांची बंगळुरु येथे भेट घेतली.\nतेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव एका राष्ट्रीय आघाडीसाठी फार पूर्वीपासूनच प्रयत्नशील होते. बंगळुरुच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी गेलेल्या राव यांनी देवेगौडा यांची भेट घेऊन तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नांना सुरुवात केली. 2019 साली भाजपा आणि काँग्रेस व्यतिरिक्त इतर पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावे यासाठी राव प्रयत्न करत आहेत. एच.डी देवेगौडा यांचे पुत्र एच. डी. कुमारस्वामी यांचीही राव भेट घेणार आहेत.\nमागील महिन्यामध्ये राव यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली होती. 3 मार्च रोजी राव यांनी आता लोकांना तिसऱ्या आघाडीची गरज आहे, असे विधान केले होते. लोकशाहीच्या गेल्या 70 वर्षांच्या प्रवासामध्ये कोणत्याही प्रकारचा गुणात्मक बदल लोकांना दिसलेला नाही, असेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आपल्या समविचारी पक्षांशी आपली चर्चा सुरु असल्याचे त्यांनी मान्य केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरुपया घसरल्याने आयटी क्षेत्रातील कंपन्या तेजीत\nNext articleराष्ट्रीय स्वयंसेवक संघ गुरुकुल शिक्षणाला देणार प्रोत्साहन\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा केरळ दौरा, ५०० कोटी रुपयाची मदत जाहीर\nकेरळमध्ये उद्भवलेल्या पूरग्रस्त परिस्थितीस राष्ट्रीय आपत्ती घोषित करा: राहुल गांधी\nविहिरीत सापडला शेतकऱ्याचा मृतदेह\nकेरळच्या मदतीस सरसावले अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, या राज्यांनी केली ‘एवढी’ मदत\nनिम्म्या कर्नाटकवर दुष्काळाचे सावट; मात्र काही भागांत पूरस्थिती\nकाश्‍मीरमधील ग्रेनेड हल्ल्यात एकाचा मृत्यूू, तिघे जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/best-retired-800-employees-three-days-120768", "date_download": "2018-08-18T10:58:17Z", "digest": "sha1:WV34PZYQZ34IEKZMBYF5ZD76N7LJBVC7", "length": 11657, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Best retired 800 employees in three days बेस्टचे तीन दिवसांत 800 कर्मचारी निवृत्त | eSakal", "raw_content": "\nबेस्टचे तीन दिवसांत 800 कर्मचारी निवृत्त\nशुक्रवार, 1 जून 2018\nमुंबई - बेस्ट उपक्रमातील 800 कर्मचारी आणि अधिकारी तीन दिवसांत सेवानिवृत्त झाले. हजारो रिक्त पदे भरण्यात प्रशासन उदासीन असल्याने बेस्टच्या सध्याच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. त्याचा परिणाम बेस्टच्या उत्पन्नावर होत असल्याची तक्रार गुरुवारी बेस्टच्या सर्वपक्षीय सदस्यांनी केली.\nमुंबई - बेस्ट उपक्रमातील 800 कर्मचारी आणि अधिकारी तीन दिवसांत सेवानिवृत्त झाले. हजारो रिक्त पदे भरण्यात प्रशासन उदासीन असल्याने बेस्टच्या सध्याच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. त्याचा परिणाम बेस्टच्या उत्पन्नावर होत असल्याची तक्रार गुरुवारी बेस्टच्या सर्वपक्षीय सदस्यांनी केली.\nबेस्ट उपक्रमात वर्षभरात तब्बल 3500 बसचालक, वाहक, अधिकारी सेवानिवृत्त झाले. तीन दिवसांत 800 कर्मचारी-अधिकारी निवृत्त झाले; मात्र बेस्ट उपक्रम रिक्त पदे भरत नसल्याने सध्याच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, बेस्टच्या उत्पन्नावरही परिणाम होत असल्याचा आरोप बेस्ट समितीचे सदस्य सुहास सामंत यांनी केला.\nरिक्त पदे न भरल्याने एका पर्यवेक्षकाला तीन-तीन आगारांचे काम सांभाळण्याची कसरत करावी लागते. तिकीट व रोख विभागात पैशांची मोजणी शिपायांना करावी लागते, अशी तक्रार भाजपचे सुनील गणाचार्य यांनी समिती अध्यक्षांकडे केली. सदस्य अनिल कोकिळ, श्रीकांत कवठणकर यांनीही रिक्त पदे भरण्याची मागणी केली.\n'एक धागा शौर्य' का सैनिकांसाठी जुन्नरच्या विद्यार्थ्यांनीचा अभिनव उपक्रम\nजुन्नर - सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांसाठी जुन्नरच्या शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थिनींनी 'एक धागा शौर्य'का हा अभिनव...\nएमआयएम नगरसेवक मतीन यांना अटक\nऔरंगाबाद- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला नकार देणारे औरंगाबादमधील एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना आज अटक करण्यात...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nबारामती - विद्या प्रतिष्ठानच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पुरस्कार\nबारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट...\nपंकज भूसे यांचा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव\nसरळगांव - महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी होऊन दिलेल्या उद्दिष्टा पेक्षा जास्त वृक्ष लागवड करून उत्कृष्ट कामगिरी केल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.starfriday2012.com/2017/12/blog-post_4.html", "date_download": "2018-08-18T10:15:50Z", "digest": "sha1:7DH4EFS4HEWEUBAC3J27YG6BNS6VE5PI", "length": 17009, "nlines": 31, "source_domain": "www.starfriday2012.com", "title": "STARFRIDAY : \"डॉ. तात्या लहाने | अंगार ... पावर इस विदीन” चे म्युझिक लाँच !!", "raw_content": "\n\"डॉ. तात्या लहाने | अंगार ... पावर इस विदीन” चे म्युझिक लाँच \n\"कथा मातृत्वाची, कथा संघर्षाची, कथा त्यागाची, कथा जिद्धीची\"\nपद्मश्री डॉ. तात्या लहाने यांच्या कारकिर्दीला मानवंदना देणारा आणि त्यांच्या संघर्षात्मक जीवनावर दृष्टिक्षेप टाकणारा \"डॉ. तात्या लहाने | अंगार... पॉवरइज विदीन\" या चित्रपटाचा वणवा संपूर्ण महाराष्ट्रभर पेटतच चाललाय. अश्या या चित्रपटाच्या गाण्याचा दिमाखदार प्रकाशन सोहळा सिटी लाइट बँक्वेट्समाहीम (पश्चिम) येथे करण्यात आला. यावेळी मकरंद अनासपुरे, अलका कुबल, डॉ. निशिगंधा वाड, साधना सरगम, चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते विरागमधुमालती वानखडे, सहाय्यक निर्मात्या वंदना वानखडे, चित्रपट सादरकर्ते रीना अग्रवाल, समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया ई. मान्यवर उपस्थित होते.चित्रपटाने रिले सिंगिंगच्या माध्यमातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्वविक्रम नोंदविलेल्या 'काळोखाला भेदून टाकू जीवनाला उजळून टाकू' यागीताचे साधना सरगम आणि विराग यांनी सादरीकरण करून आनंद द्विगुणीत केला.\nसंपूर्ण महाराष्ट्रातील गावा-गावात व खेड्यापाड्यात या चित्रपटाचे प्रमोशन सुरु असून अतिशय भरभरून प्रतिसाद मिळत आहे. बऱ्याच शाळा व महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी ग्रुप बुकिंग केले आहे. लायन व रोटरी क्लब तर्फे देखील गरीब विद्यार्थ्यांना व आश्रम शाळांना या चित्रपटाचा लाभ घेता यावा म्हणून ग्रुप बुकिंग ची मागणी केली आहे.\n\"डॉ. तात्या लहाने ... अंगार... पॉवर इज विदीन\" हा चित्रपट विराग मधुमालती एंटरटेनमेंट निर्मित असून तो १२ जानेवारी २०१८ रोजी चित्रपटगृहातप्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट डॉ. तात्या लहाने यांच्या जीवनावर प्रक्षेपित केला असून कसे त्यांनी बिकट परिस्थितीचा सामना करत आपले वैद्यकीयशिक्षण पूर्ण केले व या क्षेत्रात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे तसेच त्यांच्या आईने स्वतःची एक किडनी तात्यांना दान करून त्यांनापुनर्जन्म देऊन समाजाला अवयव दानाचा महत्वपूर्ण संदेशही यातून दिला आहे. डॉ. लहानेंचा ध्यास, कष्ट, संघर्ष व त्यांच्या आईची त्यांना मिळालेलीसाथ एकूणच त्यांच्या आयुष्यातील घडलेल्या घटना इतरांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या आहेत. डॉ. तात्या लहाने यांची ही \"बायोपिक\" आजच्या तरुणाईसाठीनक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. हा चित्रपट समाजाला नवीन दिशा व विद्यार्थी वर्गाला नवचैतन्य व प्रेरणा देणारा ठरेल असा विश्वास चित्रपटाच्या विशेष सादरीकरणानंतर समाजातील प्रत्येक घटकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.\nया चित्रपटाने रिले सिंगिंगच्या माध्यमातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्वविक्रम नोंदविला असून 'काळोखाला भेदून टाकू जीवनाला उजळूनटाकू'... हे गाणं सिनेमात गायिका साधना सरगम आणि विराग यांनी स्वतः गायले आहे. “का रे माझ्या मना छळतोस तू मला” हे तात्यारावांच्या जीवनातील अनेक उतार चढाव दर्शविणारे गीत केतकी माटेगावकर व विराग यांच्या आवाजात आहे. तसेच त्यांच्या बालपणीचा कठोर संघर्ष व त्यांची जिद्द “झाले घाव जरी काळजा तरी..हूर हूर ना आता या जीवा” या गीताद्वारे मांडण्यात आली आहे. चित्रपटाचे संगीत “एक हिंदुस्तानी” नामक संगीतकाराने दिले असून त्यांनी आपले नाव गुपित ठेवून तात्यांच्या कार्याला आपल्या संगीताद्वारे मानवंदना दिली आहे. चित्रपटाचे पार्श्वसंगीत समीर – सचिन यांचे असून विराग मधुमालती व राहुल साळवे यांनी गाणी स्वरबद्ध केली आहेत.\nया चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपुरे हे डॉ. लहाने यांच्या प्रमुख भूमिकेत असून, अलका कुबल ह्या त्यांच्या आई अंजना बाईंच्या भूमिकेत आहेत.डॉ. रागिणी पारेख यांच्या भूमिकेत डॉ निशिगंधा वाड असून भारत गणेशपुरे व रमेश देव यांनीही विशेष भूमिका साकारल्या आहेत.\"डॉ. तात्या लहाने | अंगार ... पावर इस विदीन” चे म्युझिक लाँच \n\"कथा मातृत्वाची, कथा संघर्षाची, कथा त्यागाची, कथा जिद्धीची\"\nपद्मश्री डॉ. तात्या लहाने यांच्या कारकिर्दीला मानवंदना देणारा आणि त्यांच्या संघर्षात्मक जीवनावर दृष्टिक्षेप टाकणारा \"डॉ. तात्या लहाने | अंगार... पॉवरइज विदीन\" या चित्रपटाचा वणवा संपूर्ण महाराष्ट्रभर पेटतच चाललाय. अश्या या चित्रपटाच्या गाण्याचा दिमाखदार प्रकाशन सोहळा सिटी लाइट बँक्वेट्समाहीम (पश्चिम) येथे करण्यात आला. यावेळी मकरंद अनासपुरे, अलका कुबल, डॉ. निशिगंधा वाड, साधना सरगम, चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते विरागमधुमालती वानखडे, सहाय्यक निर्मात्या वंदना वानखडे, चित्रपट सादरकर्ते रीना अग्रवाल, समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया ई. मान्यवर उपस्थित होते.चित्रपटाने रिले सिंगिंगच्या माध्यमातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्वविक्रम नोंदविलेल्या 'काळोखाला भेदून टाकू जीवनाला उजळून टाकू' यागीताचे साधना सरगम आणि विराग यांनी सादरीकरण करून आनंद द्विगुणीत केला.\nसंपूर्ण महाराष्ट्रातील गावा-गावात व खेड्यापाड्यात या चित्रपटाचे प्रमोशन सुरु असून अतिशय भरभरून प्रतिसाद मिळत आहे. बऱ्याच शाळा व महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी ग्रुप बुकिंग केले आहे. लायन व रोटरी क्लब तर्फे देखील गरीब विद्यार्थ्यांना व आश्रम शाळांना या चित्रपटाचा लाभ घेता यावा म्हणून ग्रुप बुकिंग ची मागणी केली आहे.\n\"डॉ. तात्या लहाने ... अंगार... पॉवर इज विदीन\" हा चित्रपट विराग मधुमालती एंटरटेनमेंट निर्मित असून तो १२ जानेवारी २०१८ रोजी चित्रपटगृहातप्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट डॉ. तात्या लहाने यांच्या जीवनावर प्रक्षेपित केला असून कसे त्यांनी बिकट परिस्थितीचा सामना करत आपले वैद्यकीयशिक्षण पूर्ण केले व या क्षेत्रात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे तसेच त्यांच्या आईने स्वतःची एक किडनी तात्यांना दान करून त्यांनापुनर्जन्म देऊन समाजाला अवयव दानाचा महत्वपूर्ण संदेशही यातून दिला आहे. डॉ. लहानेंचा ध्यास, कष्ट, संघर्ष व त्यांच्या आईची त्यांना मिळालेलीसाथ एकूणच त्यांच्या आयुष्यातील घडलेल्या घटना इतरांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या आहेत. डॉ. तात्या लहाने यांची ही \"बायोपिक\" आजच्या तरुणाईसाठीनक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. हा चित्रपट समाजाला नवीन दिशा व विद्यार्थी वर्गाला नवचैतन्य व प्रेरणा देणारा ठरेल असा विश्वास चित्रपटाच्या विशेष सादरीकरणानंतर समाजातील प्रत्येक घटकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.\nया चित्रपटाने रिले सिंगिंगच्या माध्यमातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्वविक्रम नोंदविला असून 'काळोखाला भेदून टाकू जीवनाला उजळूनटाकू'... हे गाणं सिनेमात गायिका साधना सरगम आणि विराग यांनी स्वतः गायले आहे. “का रे माझ्या मना छळतोस तू मला” हे तात्यारावांच्या जीवनातील अनेक उतार चढाव दर्शविणारे गीत केतकी माटेगावकर व विराग यांच्या आवाजात आहे. तसेच त्यांच्या बालपणीचा कठोर संघर्ष व त्यांची जिद्द “झाले घाव जरी काळजा तरी..हूर हूर ना आता या जीवा” या गीताद्वारे मांडण्यात आली आहे. चित्रपटाचे संगीत “एक हिंदुस्तानी” नामक संगीतकाराने दिले असून त्यांनी आपले नाव गुपित ठेवून तात्यांच्या कार्याला आपल्या संगीताद्वारे मानवंदना दिली आहे. चित्रपटाचे पार्श्वसंगीत समीर – सचिन यांचे असून विराग मधुमालती व राहुल साळवे यांनी गाणी स्वरबद्ध केली आहेत.\nया चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपुरे हे डॉ. लहाने यांच्या प्रमुख भूमिकेत असून, अलका कुबल ह्या त्यांच्या आई अंजना बाईंच्या भूमिकेत आहेत.डॉ. रागिणी पारेख यांच्या भूमिकेत डॉ निशिगंधा वाड असून भारत गणेशपुरे व रमेश देव यांनीही विशेष भूमिका साकारल्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.vicharyadnya.com/2010/11/siddhayoga-article-vicharyadnya.html", "date_download": "2018-08-18T10:34:32Z", "digest": "sha1:UCFHFE55NFJ5JGVDLRGXXTLQBDE3T23N", "length": 12079, "nlines": 52, "source_domain": "www.vicharyadnya.com", "title": "सिद्धयोग (महायोग )१", "raw_content": "\nयापूर्वी आपण काव्यरुपाने सिद्धयोगाचे वर्णन पाहिले. आज आपण सिद्धयोगाचे वर्णन विस्ताराने पाहू.\n\" ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असो द्यावे समाधान. \"\nभावव्याख्या : वरील ओळी आपल्या सर्वांच्या अगदी परिचयाच्या आहेत. आयुष्यात जे काही घडणार आहे, ते तर ईश्वराच्या इच्छेनेच मग व्यर्थ चिंता करून काय मिळेल मग व्यर्थ चिंता करून काय मिळेल शरीर आणि मन जळत राहील. म्हणून सदा समाधान बाळगावे.\nपण हे कसे शक्य आहे मनात जर चिंता, काळजी, नकारात्मक विचार येत असतील तर करणार काय मनात जर चिंता, काळजी, नकारात्मक विचार येत असतील तर करणार काय नाही नियंत्रण होत नकारात्मक विचार ऊर्जा खातात आणि सकारात्मक सुद्धा\nनामस्मरणाने हे सगळं शांत होतं, असं सारे संत स्वानुभवाने सांगतात. सिद्धायोगाने हे सहज सुलभ झाले आहे, कारण इथे केवळ सद्गुरुकृपाच सगळे करते. काही कारणाने शक्तिपात दीक्षा घेण्याची तयारी होत नसल्यास, तशी तयारी अपोआप व्हावी व सर्वांनाच हा सुंदर अनुभव प्राप्त व्हावा, म्हणून अपार करुणामयी सद्गुरुमाउली परम पूज्य श्री नारायणकाका ढेकणे महाराजांनी सिद्धयोग पूर्वाभ्यासाचा अनमोल खजिनाच सर्वांसाठी मुक्त करून दिलेला आहे.\nसिद्धयोग साधनेने आणि त्याच्या पूर्वाभ्यासाने मनाचा हा छळ अगदी सहज आणि तत्काळ शांत होऊ शकतो आणि आनंदाचा खजिनाच, सदा प्रवाहित होणारा झराच प्राप्त होऊ शकतो. करायचे काय तर अगदी काहीही नाही. आश्चर्य वाटलं ना अहो ही एक मोठी गम्मतच आहे, अगदी ( fun ) मजाच आहे. आपोआप होणाऱ्या श्वासोच्वासावर मन अगदी सोडून द्यायचे. मनाला म्हण हवा तेवढा गोंधळ घाल. आम्हाला कसलीही भीती नाही. आमचा श्वास चालूय ना मग भीती कसली आपलं म्हणून काही नियंत्रण ठेवायचच नाही.\nनामस्मरणानेही हेच होणार. सतत नाम चालू आहे आणि साधना म्हणजे प्राणसाधना नियमित चालू आहे . मनाच्या सर्व वृत्ती अखंडपणे प्राणात / नामात विलीन होत जातात. मग उदय होतो परमशांतीचा आणि परमानंदाचा\n हे शांतपणे, धीराने होऊ देत जावे, विचार निघून जाऊ द्यावे. कधी कधी त्रास वाटतो, नको हे सगळं काही उपयोग होत नाही, असंही वाटतं. पण धीर सोडू नये, मनाचेच खेळ ते काही उपयोग होत नाही, असंही वाटतं. पण धीर सोडू नये, मनाचेच खेळ ते घाबरायच काय. सद्गुरूंचे, ईश्वराचे (गुरु म्हणजे ईश्वर आणि ईश्वर म्हणजे गुरु घाबरायच काय. सद्गुरूंचे, ईश्वराचे (गुरु म्हणजे ईश्वर आणि ईश्वर म्हणजे गुरु ) वचन आहे सर्वांना \" सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज| \" \" अभयं सर्वभूतेभ्यो ददाम्येतद व्रतं मम| \" प्राणात- साधना चालू असताना आणि इतर वेळी नामात सर्व लीन होऊ देणं , म्हणजेच \"सर्व धर्मान परित्यज्य\". मनाच्या वृत्तींच्या आहारी जाण, हेच तर मनाचे धर्म, त्यांच्या आहारी जाऊ नये, त्यांचा परित्याग सहज झाला, मग तो अभय देणारच.\nसगळ्या संतानी हेच सांगितले आहे. सद्गुरुमाउली नारायण काकांनी वारंवार हाच उपदेश दिला आहे . प्राण हाच देव आणि देव हाच प्राण हेच वेगळ्या शब्दात म्हणजे ' ठेविले अनंते ...' या शब्दांत सांगितले आहे . आपोआप होणाऱ्या क्रियांना साधने /पूर्वभ्यासा दरम्यान पूर्ण स्वातंत्र्य द्यावे. पूर्ण अप्रतिकार हेच वेगळ्या शब्दात म्हणजे ' ठेविले अनंते ...' या शब्दांत सांगितले आहे . आपोआप होणाऱ्या क्रियांना साधने /पूर्वभ्यासा दरम्यान पूर्ण स्वातंत्र्य द्यावे. पूर्ण अप्रतिकार प्राणरूपी, चैतन्यरूपी आईस पूर्ण समर्पण. असा हा अमृताहूनही गोड सोप्पा अभ्यास सगळ्यांनी जरूर करून बघावा, अशी विनंती आहे. या नवरात्रात शक्तिची ही आत्मपूजा सर्वांनी अनुभवावी. सद्गुरुमाउलीने आपल्या सर्वांच्या कल्यानासाठी हे सुन्दर वरदानच दिलेले आहे, त्याचा अनुभव अगदी सगळ्यांनी घ्यावाच. गुरूदेवांचा महान संकल्पच आहे, \" सर्वे पि सिद्धयोग दीक्षिता: भवन्तु | \".\nविचार हे कर्मांचे, शुभाशुभ कर्मांचे बीज आहे , त्यात जर ' ठेविले अनंते तैसेची ' राहील तर साधनेशिवाय इतर वेळही कर्मांवर हळूहळू नियंत्रण येईल, आणि ते पण आपोआप होऊ लागतील. मग ' चित्ती समाधान ' आपोआपच राहील.\nआधी आलेल्या प्रश्नांचे हेच उत्तर आहे. सिद्धयोगाच्या पूर्ण माहिती साठी परम पूज्य काकामहाराजांचे ' सिद्धयोग (महायोग )' हे पुस्तक बघावे, तसेच http://www.mahayoga.org/ या सिद्धायोगाविषयीच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी ही विनंती.\nगणपती उजव्या सोंडेचा की डाव्या - भ्रम, भीती, आणि वास्तव\nगणेश पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे सगळे खरे आहे का\nसोवळे-ओवळे ही फसवणूक कुणाची\nसोवळे मोडले या विषयावरून फसवणुकीचा गुन्हा आणि पुढचे वाद सध्या सुरु आहेत. याविषयावर मनात सोवळ्या ओवळ्याच्या विश्वास व वादांवर काही मूलभूत प्रश्न उठले. त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात आहे. या पोस्टचा उद्देश केवळ एका विशिष्ट घटनेवर चर्चा करण्याचा नाही त्यामुळे कृपया कुठलेही मत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी मानू नये.\nकाल काय लिहावं सुचत नव्हतं. त्यावेळी माझ्या कवितेनेच मला प्रेरणा दिली. ती प्रेरणाच आजची कविता \"कविता हृदयात वसणारी\"\nप्रतिमा: कृष्णमोहिनी प्रतिमा ब्लॉगसंग्रहातून\nमी कविता तुझ्या हृदयात वसणारी\nकॉपीराईट: या ब्लॉग वरील सर्व कविता व लेख यांचे सर्वाधिकार ब्लॉग लेखिकेकडे सुरक्षित. या ब्लॉगवरील कुठलाही कन्टेन्ट इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट माध्यमात पुनर्प्रकाशित करण्यापूर्वी लेखिकेची लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे. ©️ मोहिनी पुराणिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/sports-news-sri-lanka-vs-zimbabwe-58826", "date_download": "2018-08-18T10:32:12Z", "digest": "sha1:IRABCVKREZMAIYVELRK465I4SR2K72K5", "length": 13471, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news Sri Lanka vs Zimbabwe झिंबाब्वेचा आठ वर्षांत प्रथमच परदेशात विजय | eSakal", "raw_content": "\nझिंबाब्वेचा आठ वर्षांत प्रथमच परदेशात विजय\nमंगळवार, 11 जुलै 2017\nहंबनतोता - आपल्याच क्रीडामंत्र्याकडून ढेरपोटे, तसेच अनफिट हिणवले गेलेल्या श्रीलंकेस झिंबाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत हार पत्करावी लागली. जागतिक क्रमवारीत अकरावे असलेल्या झिंबाब्वेने आठ वर्षांत परदेशात प्रथमच मालिका जिंकली.\nहंबनतोता - आपल्याच क्रीडामंत्र्याकडून ढेरपोटे, तसेच अनफिट हिणवले गेलेल्या श्रीलंकेस झिंबाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत हार पत्करावी लागली. जागतिक क्रमवारीत अकरावे असलेल्या झिंबाब्वेने आठ वर्षांत परदेशात प्रथमच मालिका जिंकली.\nचॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंका साखळीतच गारद झाल्यावर सरकारने सर्व क्रिकेटपटूंची तंदुरुस्त चाचणी घेतली होती. त्या अहवालानंतर संघातील एकही खेळाडू फीट नाही, असे श्रीलंकेचे क्रीडामंत्री दयासिरी जयसेकरा यांनी सांगितले होते. एवढेच नव्हे, तर क्रिकेटपटूंचे बॉडी फॅट सरासरी १६ टक्के असते. श्रीलंका क्रिकेटपटूत हेच प्रमाण २६ टक्के असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्या वेळी त्यांनी खेळाडूंना तंदुरुस्त होण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली होती. आता या पराभवानंतरची त्यांची टिप्पणी महत्त्वाची असेल.\nझिंबाब्वेची फिरकी श्रीलंकेची डोकेदुखी ठरली. झिंबाब्वेचा ऑफ स्पिनर सिकंदर रझा याने २१ धावांत तीन विकेट्‌स घेत श्रीलंकेला ८ बाद २०३ असे रोखले. झिंबाब्वेने तीन विकेट्‌स आणि ७१ चेंडू राखत विजयी लक्ष्य गाठले.\nझिंबाब्वेचा डाव एक बाद १३७ वरून सात बाद १७५ असा घसरला होता, पण रझा (२७) आणि कर्णधार ग्रॅमी क्रेमर (११) यांनी २९ धावांची नाबाद भागीदारी करीत ऐतिहासिक विजय मिळवून दिला.\n२००९ नंतर झिंबाब्वेचा परदेशात विजय, त्या वेळी केनिया ५-० सरशी. त्यानंतरच्या बारा मालिकांत पराभव. त्यात अफगाणिस्तान तसेच आयर्लंडविरुद्धही हार\n२००१ नंतर प्रथमच कसोटी दर्जा असलेल्या संघाविरुद्ध मालिका विजय. त्या वेळी मायदेशात बांगलादेशविरुद्ध विजय.\nकसोटी दर्जा असलेल्या संघांविरुद्धच्या २९ मालिकांपैकी तिसरा विजय.\nसरत्या मालिकेत झिंबाब्वेचा स्ट्राईक रेट ९६.१६ तर श्रीलंकेचा ८८.१४. झिंबाब्वेची चौकारातही (१४३-१२८) हुकूमत\nश्रीलंका मायदेशातील सलग तिसऱ्या मालिकेत विजयाविना. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध हार, तर बांगलादेशविरुद्ध बरोबरी.\nया मालिकेत धावांचा पाठलाग करताना तीन लढतीत विजय.\nऔरंगाबाद : 'एमआयएम'च्या नगरसेवकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा\nऔरंगाबाद : महापालिकेत एमआयएम नगरसेकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या पाच नगरसेवकांविरोधात शुक्रवारी (ता.17) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयएम नगरसेवक...\nघरकामगार, बांधकाम मजूर महिलांची उपेक्षाच\nजळगाव : दिवसरात्र काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, पण डोक्‍यावर हक्काचं छत नाही...सतत कष्ट करूनही पदरी काहीच न पडल्यामुळे अनेकदा उपवास...\nथ्री डी कोलाजमधून साकारले शिवचरित्र\nइचलकरंजी - जिद्द आणि चिकाटी ठेवत तब्बल ७ वर्षे परिश्रम घेत, येथील डॉ. ज्योती दशावतार बडे यांनी थ्री डी कोलाजमधून अवघे शिवचरित्र साकारले आहे. हा...\nपावसमध्येही होमिओपॅथिक हॉस्पिटल उभारू - राऊत\nरत्नागिरी - हार-तुऱ्यांसाठी आमची पदे नाहीत. जनसेवेची आमची भूमिका आहे. १०० टक्के समाजकार्य करून तुमचे आशीर्वाद मिळविण्यातच आम्हाला धन्यता मिळते....\nश्री समर्थ दूध उत्पादक संस्थेस प्रथम क्रमांक\nमंगळवेढा : सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे मंगळवेढा तालुक्यात दूधाचे उत्पादन घटले असताना या कठीण परिस्थितीवर मात करत येथील श्री समर्थ महिला दूध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/wanchitanche-vartaman-news/agriculture-in-maharashtra-5-1622191/", "date_download": "2018-08-18T11:14:45Z", "digest": "sha1:47LZL6QTBGZTJAKB7U523UMSIM6E2FAI", "length": 26506, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Agriculture in Maharashtra | शेतकरी व गरिबीचा सामाजिक पैलू | Loksatta", "raw_content": "\nबेशिस्त वाहनचालकांना ९१ लाखांचा दंड\nपक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा\nपुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित\nजळगावमध्ये महाजन-खडसे गटबाजीची सर्वत्र बाधा\nएमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल\nशेतकरी व गरिबीचा सामाजिक पैलू\nशेतकरी व गरिबीचा सामाजिक पैलू\nमहाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जीवघेणी दुरवस्था प्रत्येकालाच माहीत आहे.\nमहाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जीवघेणी दुरवस्था प्रत्येकालाच माहीत आहे. लागोपाठ तोटय़ात राहणारी शेती ही शेतकऱ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत आहे. सरकारचे व समाजाचे लक्ष या हृदयद्रावक घटनांकडे जाते. आत्महत्यांची दखल घेतली जाणे आवश्यक आहेच. परंतु कमी उत्पन्नामुळे जी उपासमार, कुपोषण व मुलांची शिक्षणातून गळती तसेच इतर दुष्परिणाम शेतीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांना भोगावे लागतात, त्याकडे मात्र सरकारचे पुरेसे लक्ष जात नाही. हा दुष्परिणाम महाराष्ट्रातील शेतकरी निमूटपणे आणि असहायपणे सहन करत जगतो. संपूर्ण महाराष्ट्रात, आणि विशेषत: फार मोठय़ा कोरडवाहू व कमी सिंचन असलेल्या भागात शेती उत्पन्नामधील वारंवार होणारे चढउतार, योग्य कृषीधोरणाचा अभाव तसेच ते असलेल्या उपाययोजना राबविण्याची सरकारची असमर्थता हे सारेच शेतकऱ्याच्या गरिबीला कारणीभूत ठरतात. सांख्यिकी माहितीतून शेतकऱ्याच्या गरिबीचे जे स्वरूप दिसते त्यामधूनदेखील आपणास हे पाहायला मिळते.\nसन २०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील जवळपास ५५ टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. या ग्रामीण लोकसंख्येच्या उदरनिर्वाहाची चार साधने आहेत- शेती, अकृषी उद्योग/व्यवसाय, मजुरी-रोजंदारी आणि नियमित वेतनाधारी नोकऱ्या. सन २०१२ मधील पाहणीनुसार ४४ टक्के कुटुंबांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. मात्र शेती करणाऱ्यांचे प्रमाण जातीनुसार भिन्न आहे. हे प्रमाण उच्च जातींमध्ये ४६ टक्के, इतर मागास जाती ४१ टक्के, आदिवासी ३१ टक्के आणि दलित फक्त २१ टक्के. मुस्लीम आणि बौद्ध समुदायातील ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण अनुक्रमे २३ आणि १८ टक्क्यांपर्यंत आहे. यावरून असे दिसते की, ‘शेती’ हा व्यवसाय असणाऱ्यांचे प्रमाण ग्रामीण भागात उच्च जाती इतर मागासवर्गीयांत सर्वाधिक आहे. तुलनेने दलित व बौद्धांमध्ये शेतकऱ्यांचे प्रमाण सर्वात कमी आहे. परंपरेमुळे दलितावर शेती करण्यास जे बंधन होते, त्याचा हा परिणाम आहे.\nराज्यातील कृषीक्षेत्राच्या दुरवस्थेमुळे २०१२ मध्ये कमीतकमी २० टक्के शेतकरी कुटुंबे ही गरीब आहेत. ही कुटुंबे शेतकरी असली तरी दारिद्रय़ाच्या दुष्टचक्रात भरडली जात आहेत. विशेष म्हणजे, हे प्रमाण राज्याच्या (सरासरी १७ टक्के कुटुंबे दारिद्रय़रेषेखाली, या) प्रमाणापेक्षा जास्त आहे. यावरून शेतीच्या वाईट स्थितीची जाणीव होते. गरीब शेतकरी हे मुख्यत: अल्पभूधारक (पाच एकरांपेक्षा कमी जमीन) आहेत. महाराष्ट्रात एकूण शेतकऱ्यांपैकी ९५ टक्के शेतकरी गरीब आहेत. उरलेले फक्त पाच टक्के भूधारकच गरिबीमधून सुटले आहेत. या आकडेवारीतून हे दिसते की एकंदर दहा एकरांपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न त्यांच्या उदरनिर्वाहाच्या मूलभूत गरजा भागविण्या इतपतही पुरेसे नाही. याचा अर्थ हा की साधारणत: जमीनधारणा १० एकर किंवा सहा एकर सिंचित यापेक्षा जास्त असेल तर गरिबीतून जेमतेम मुक्तता होऊ शकते. ९५ टक्के अल्पभूधारक शेतकऱ्यांकरिता धोरण असूनही, गरिबी दूर करण्यासाठी उत्पन्नात वाढ करणे हे जबरदस्त आव्हान महाराष्ट्र शासनापुढे आजही कायम आहे.\nदुसरे आव्हान आहे ते दलित व आदिवासी शेतकऱ्यांच्या हलाखीचे. आदिवासी व दलित शेतकरी इतरांपेक्षा अधिक प्रमाणात गरीब असून त्यांची परिस्थिती अधिक भयावह आहे. विश्वास बसणार नाही एवढे, म्हणजे ५८ टक्के आदिवासी शेतकरी गरीब आहेत. त्यापाठोपाठ, २८ टक्के नवबौद्ध (जे सर्व दलित आहेत), १८ टक्के सर्व दलित व १८ टक्के मुस्लीम गरीब आहेत. त्या पाठोपाठ १५ टक्के ओबीसी गरीब आहेत व तुलनेने सर्वात कमी (१३ टक्के) गरिबी उच्च जातींमध्ये आहे. अर्थात उच्च जातीय शेतकऱ्यांपेक्षा आदिवासी शेतकऱ्यांमधील गरिबी चार पटींनी, तर दलित शेतकऱ्यांमधील गरिबी दोन पटींनी जास्त आहे.\nआदिवासी व दलित शेतकरी अधिक गरीब असण्याची काही कारणे आहेत. सन २०१३ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या, २५९४ शेतकऱ्यांच्या मिलेनियम सर्वेक्षणाततून आपल्याला त्यांच्या गरिबीची कारणे पाहायला मिळतात. हे शेतकरी आपल्या शेतातील पिकांसाठी आवश्यक असणाऱ्या बीज, खते, औषधे व सिंचन अशा साधनाचा अपुऱ्या प्रमाणात वापर करतात, परिणामत: शेतीतील उत्पन्न घटते आणि त्यांना दारिद्रय़ात ढकलते. सन २०१३ मध्ये दर हेक्टरी आदिवासी शेतकऱ्याचा खर्च २६६४२ रुपये, दलित शेतकरी रुपये १९९०४ व या तुलनेत उच्चजातींच्या शेतकऱ्यांचा खर्च ४३८९२ रुपये आणि ओबीसी ३२१६० रुपये, तर मुस्लीम शेतकऱ्याचा खर्च रुपये ३०३१४, जो दलित व आदिवासींच्या हेक्टरी खर्चापेक्षा जास्त आहे.\nआदिवासी व दलित या शेतकऱ्याचा खर्च (किंवा उत्पन्नासाठी दर वर्षी करावीच लागणारी गुंतवणूक- इनपुट्स किंवा निविष्ठांवरील खर्च) कमी असल्यामुळे त्यांचे दर हेक्टरी उत्पन्न इतरांच्या तुलनेत फार कमी आहे. सन २०१३ मध्ये दर हेक्टरी कृषी उत्पन्न आदिवासी शेतकरी ४८०८६ रुपये, दलित शेतकरी ५४६३५ रुपये, या तुलनेत ओबीसी शेतकऱ्यांचे उत्पन्न ८६४८४ रुपये, उच्च जातीच्या शेतकऱ्यांचे १०७५८४ रुपये, मुस्लीम शेतकऱ्यांचे ५३४९९ रुपये. या आकडेवारीवरून उच्च जाती, ओबीसी व मुस्लीम शेतकऱ्यांच्या तुलनेने आदिवासी व दलित शेतकऱ्यांचे प्रति हेक्टरी उत्पन्न कमी असल्याचे दिसून येते.\nदलित आणि आदिवासी शेतकऱ्यांकडून शेतीसाठी साधनांचा आणि निविष्ठांचा वापर कमी असण्यामागे काही कारणे आहेत. आदिवासी व दलित शेतकऱ्यांच्या कर्जधारणेचे प्रमाण उच्चवर्गीय शेतकऱ्यांच्या तुलनेने कमी आहे, हे आकडेवारीने सिद्ध होण्याजोगे कारण आहे. सन २०१३ मध्ये उच्च जातीय व ओबीसी प्रवर्गातील ६० ते ६२ टक्के शेतकऱ्यांना कर्जाचा लाभ मिळाला आहे. त्यामानाने दलित वर्गातील ५० टक्के व आदिवासी वर्गातील ३२ टक्के शेतकरी कर्जाचे लाभार्थी आहेत. उच्च जातीय व ओबीसी हे सहकारी / कमर्शिअल बँकांकडूनसुद्धा जास्त कर्ज घेतात. शेती कर्जे घेणाऱ्या शेतकऱ्यांची सामाजिक वर्गानुसार वर्गवारी पुढीलप्रमाणे आहे – उच्च जातीतील ७२ टक्के, ओबीसी ५७ टक्के, आदिवासी ५२ टक्के व दलित शेतकरी ४६ टक्के.\nदलित शेतकऱ्यांच्या कमी उत्पन्नाचे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे बी-बियाणे, खते, सिंचन साधने अशा साधनांची (निविष्ठांची) खरेदी करण्यात दलित शेतकऱ्यांचा बाजारातील जातीय भेदभावाचा अनुभव. सन २०१३च्या एका सर्वेक्षणात हे आढळले आहे. कृषी उत्पादन मालाच्या विक्री व्यवहारातसुद्धा जातिभेदाचा फटका बसत असल्यास त्याचा परिणाम कमी उत्पन्न मिळण्यात होतो. या प्रत्यक्ष मालविक्रीच्या पातळीआधीही दलित शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी व्यवहारात जातिभेदामुळे तीन पातळ्यांवर परिणाम होतात : (१) शेती साधनांचा अपुरा पुरवठा व त्यामुळे साधनांचा अपुरा वापर. (२) बऱ्याच वेळा जादा किमतीने खते, बी-बियाणे, सिंचन, औषधे विकत घ्यावी लागणे. (३) साधनांचा वापर कमी असल्यामुळे दर हेक्टरी कृषी उत्पादकता कमी व त्यामुळे ओघानेच दर हेक्टरी उत्पन्न कमी. असे हे दलितांच्या शेतीचे गंभीर स्वरूप आहे.\nआदिवासी शेतकऱ्यांनासुद्धा काही विशेष अडचणीना तोंड द्यावे लागते. आदिवासी शेतीत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा मोठा अभाव आहे व यामुळे अपवाद वगळता, शेती अद्यापही जुन्या पारंपरिक पद्धतीनेच चालते. त्यांच्या जमिनी कमी उत्पादकतेच्या आहेत, तरीदेखील त्यातून आधुनिक पद्धतीने वृक्ष लागवड, रानफुलांची व फळांची शेती आणि दुभती जनावरे पालनातून दुग्धोत्पादन व्यवसाय करता येणे सहजशक्य आहे. असे दिसते की शासनाने आदिवासींच्या शेतीचा आधुनिक आधारावर विकास करण्याच्या कामी प्रचंड अनास्था दाखवली आहे.\nमहाराष्ट्र राज्य स्थापनेच्या जवळपास सहा दशकांनंतरसुद्धा शेतकऱ्यांच्या दारिद्रय़ाची ही कर्मकहाणी आहे. ही एक शोकांतिकाच आहे. देशातील ज्या ९५ टक्के गरीब शेतकऱ्यांकडे सरासरी दहा ते बारा एकरांपेक्षा कमी जमीन किंवा सहा एकरांपेक्षा कमी सिंचित क्षेत्र आहे, त्यांना ‘अल्पभूधारक’ या व्याख्येत सामावून घेणारे सुधारित कृषी धोरण सरकारने आखणे गरजेचे आहे. तसेच आदिवासी शेतीकरिता तांत्रिक साधन तयार करणे गरजेचे आहे. दलित शेतकऱ्यांना बाजारपेठेत जो जातीय भेदभाव सहन करावा लागतो, त्यापासून संरक्षण देणारे धोरण राबवण्याचीही गरज आहे.\nशेतीची स्थिती चिंताजनक आहेच, परंतु येथेही वंचित वर्गाची स्थिती तुलनेने अधिक गंभीर, हे या विवेचनातून अधोरेखित व्हावे. पुढच्या लेखात उद्योगधंदा करणाऱ्या वर्गाची स्थिती पाहू.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n पिंपरीत पित्याने दोन मुलांची हत्या करुन केली आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nIt's Official: नात्यावर शिक्कामोर्तब करत अखेर निक-प्रियांका म्हणाले....\nसहजीवनाचा पहिला टप्पा सर, थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा\nइम्रान खानच्या शपथविधीला सिद्धूंना मानाचे स्थान, घेतली लष्करप्रमुखांची गळाभेट\nमिनी एसयुव्हीसारखं डिझाईन असलेली नवीन रेनाँ क्विड वसूल करते तुमचा पै न पै\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nअंतर्गत वाहतुकीसाठी ट्रामचा पर्याय\nवाहनांना एक टोल माफ\nरेल्वेचे संगणकीय आरक्षण केंद्र पावणेतीन तास बंद राहणार\nस्वानंद देणारे शिक्षण निवडा\nवामनदादा कर्डकांना शाहिरीतून अभिवादन\nभूगावमधील हॉटेलमध्ये कोंबडय़ांच्या झुंजीवर जुगार\nपाणी पुरेना आणि म्हणे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/minor-girl-raped-grandfather-28155", "date_download": "2018-08-18T11:05:57Z", "digest": "sha1:WAPJD5VRP74R2QW2IIWHQJ5BWSIXK4MN", "length": 11493, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "minor girl raped by grandfather अल्पवयीन नातीवर अत्याचार; ज्येष्ठासह दोघांविरुद्ध गुन्हा | eSakal", "raw_content": "\nअल्पवयीन नातीवर अत्याचार; ज्येष्ठासह दोघांविरुद्ध गुन्हा\nसोमवार, 30 जानेवारी 2017\nपुणे : अल्पवयीन नातीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 77 वर्षीय व्यक्तीसह तिघांना येरवडा पोलिसांनी अटक केली. आजोबांकडून होणारा त्रास आणि काका- मावशीकडून होणाऱ्या मारहाणीबद्दल संबंधित मुलीने शिकवणीच्या शिक्षिकेला माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.\nयाप्रकरणी 40 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून ज्येष्ठ नागरिकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.\nपुणे : अल्पवयीन नातीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 77 वर्षीय व्यक्तीसह तिघांना येरवडा पोलिसांनी अटक केली. आजोबांकडून होणारा त्रास आणि काका- मावशीकडून होणाऱ्या मारहाणीबद्दल संबंधित मुलीने शिकवणीच्या शिक्षिकेला माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.\nयाप्रकरणी 40 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून ज्येष्ठ नागरिकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई- वडिलांचे छत्र हरपल्याने पीडित मुलगी गेल्या वर्षभरापासून मावशी व काकांकडे राहते. आजोबा लैंगिक अत्याचार करीत असल्याची तक्रार पीडितेने मावशीकडे केली असता त्याकडे दुर्लक्ष करत मावशीने तिला घरकामे करण्यास भाग पाडले. वारंवार मारहाण केली.\nऔषधाची बाटली फुटल्यावरून काकाने तिला पट्ट्याने बेदम मारले होते. या संदर्भात चाइल्डलाइन संस्थेच्या प्रतिनिधींनी येरवडा पोलिसांशी संपर्क साधून फिर्याद दिली. पोलिस उपनिरीक्षक मनीषा टुले अधिक तपास करीत आहेत.\nटाकवे बुद्रुक - सावित्रींच्या लेकींना दुस-या टप्प्यात पंधरा सायकलींचे वाटप\nटाकवे बुद्रुक - आंदर मावळाच्या मिंडेवाडी तील ठाकरवस्ती, चावसरवस्ती, जाधववाडीतून पायपीट करीत येणा-या विद्यार्थ्यांसह सावित्रींच्या लेकींना दुस-या...\nपिंपरी - दोन मुलांना मारून वडिलांची आत्महत्या\nपिंपरी (पुणे) - दोन मुलांना मारून वडिलांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना शनिवारी दुपारी ताथवडे येथे घडली. शुभम बर्मन (वय १०) रूपम वर्मा (वय...\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AB%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AE/", "date_download": "2018-08-18T11:00:02Z", "digest": "sha1:BJDFY7AP7U55M5ZTLYB3UJ67PGEYF6DP", "length": 16120, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "आर्थिक फसवणूकी प्रकरणी महेश मोतेवार यांच्या मुलासह एकाला पुण्यातून अटक - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे…\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची…\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Pune आर्थिक फसवणूकी प्रकरणी महेश मोतेवार यांच्या मुलासह एकाला पुण्यातून अटक\nआर्थिक फसवणूकी प्रकरणी महेश मोतेवार यांच्या मुलासह एकाला पुण्यातून अटक\nसमृद्ध जीवन चिटफंड कंपनी द्वारे नागरिकांची आर्थिक फसवणूक करणारे महेश मोतेवार याच्या मुलासह एकाला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी (दि.१२) अटक केली आहे. गुंतवणुकदारांना ज्यादा पैशांचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अधिक तपासासाठी १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.\nअभिषेक महेश मोतेवार (वय २१, रा़. गणराज हाईट्स, बालाजीनगर, धनकवडी) हा समृद्ध जीवन चिटफंड कंपनीचे मालक महेश मोतेवार याचा मुलगा आहे. तर कंपनीचे संचालक प्रसाद किशोर पारसवार (वय ३२, रा़. कृष्णामाई सोसायटी, तळजाई पठार, धनकवडी) या दोघांनाही राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे.\nसध्या महेश मोतेवार आणि त्यांची पत्नी अटक आहेत. समृद्ध जीवनचे संचालक महेश मोतेवार यांनी गुंतवणुकीचे आमिष दाखवून देशभरातील गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा केले होते. सेबीनेही त्यांच्यावर बाजारातून पैसे गोळा करण्यावर निर्बंध घातले होते. त्यानंतरही कंपनीने ठेवी स्वीकारल्या. सेबीच्या तक्रारीवरून मोतेवारसह इतरांविरुद्ध विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र आणि ओरिसामधील चिटफंड गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने समृद्ध जीवनच्या सर्व कंपन्या आणि कार्यालयांना टाळे ठोकले आहे.\n काँग्रेस पक्ष बारामती लोकसभा लढणार म्हणजे आमचे डिपॉजिटच जप्त की राव…- अजित पवार\nNext articleअजितदादांच्या गौप्यस्फोटानंतर शिवाजीराव आढळराव पाटलांचाही धक्कादायक राजकीय गौप्यस्फोट\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nराज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या फ्लॅटमध्ये चोरीचा प्रयत्न\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपाण्याने भरलेल्या पातेल्यात पडून दोन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू\nजातीनिहाय आरक्षणात कोणतेही बदल केले जाणार नाहीत – पंतप्रधान मोदी\n‘माणसं आडवा आणि त्यांची जिरवा’, यामुळे जलसंधारणाची कामे रखडली – मुख्यमंत्री\nवीरपत्नींना एसटी महामंडळाकडून आजीवन मोफत पास\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपुण्यात दोन दिवसात ४८८ मद्‌यपी वाहन चालकांवर पोलिसांची कारवाई; न्यायालयात खटले...\nपुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बस उलटली; दोघांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%91%E0%A4%A8-2/", "date_download": "2018-08-18T10:59:58Z", "digest": "sha1:EZIOYA4RULKESIE2SKX7GZP4SZ4LXW45", "length": 13878, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पुण्यात एका वर्षानंतर ऑनर किलिंगचा प्रकार उघड; मामा आणि चुलत भावानेच केला तरुणाचा खून - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे…\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची…\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Notifications पुण्यात एका वर्षानंतर ऑनर किलिंगचा प्रकार उघड; मामा आणि चुलत भावानेच केला...\nपुण्यात एका वर्षानंतर ऑनर किलिंगचा प्रकार उघड; मामा आणि चुलत भावानेच केला तरुणाचा खून\nपुणे, दि. ७ (पीसीबी) – प्रेमविवाह केल्याने एका तरुणाचा त्याच्या मामाने आणि चुलत भावाने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना लोहगाव येथे ( २० जुलै २०१७) मध्ये घडली होती.\nPrevious articleपुण्यात एका वर्षानंतर ऑनर किलिंगचा प्रकार उघड; मामा आणि चुलत भावानेच केला तरुणाचा खून\nNext articleराज्यसभा उपसभापतीपदाच्या निवडणुकीत अकाली दल तटस्थ \nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nवाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nमहाराष्ट्र बंद दरम्यान पुण्यात हिंसाचार पसरवणाऱ्या आरोपीची १५ हजाराच्या जातमुचलक्यावर सुटका\nआता मुंबईप्रमाणे राज्यातील इतर ठिकाणच्या पोलिसांना मालकी हक्काची घरे मिळणार\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nकात्रजमध्ये भिशीचे पैसे न दिल्याने चुलत भावाचा सत्तुरने वार करुन खून\nदारुड्या लेकाची आईने कुऱ्हाडीचा घाव घालून केली हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-18T10:54:04Z", "digest": "sha1:DT6FTQZKV3S5INPXTQORAXKXCKZCZCRP", "length": 8242, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "धक्कादायक! दारु विक्रीसाठी रुग्णवाहिकेचा वापर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n दारु विक्रीसाठी रुग्णवाहिकेचा वापर\nअहमदाबाद : दारुबंदी असलेल्या गुजरात राज्यात महागडी दारू पोहोचण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजस्थानहून अहमदाबादला नियमित दारू पोहोचवत असताना पोलिसांनी याचा भांडापोड केला.\nभारतीय बनावटीची विदेशी दारू (IMFL) नियमितपणे राजस्थान ते अहमदाबाद पोहोचवली जात असे. दारुबंदी असलेल्या गुजरात राज्यात दारू पोहोचण्यासाठी कोणाला संशय येऊ नये तसेच चेकनाक्यावर तपासणी होऊ नये यासाठी रुग्णवाहिकेचा वापर करण्यात येत होता. अहमदाबादमधील महादेव इस्टेट या ठिकाणी रुग्णवाहिकेतील दारू रिक्षात नेत असताना पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली. तर रुग्णवाहिकेचा चालक फरार झाला.\nरुग्णवाहिकेत १,६५० दारुच्या बाटल्या मिळाल्या आहेत. या दारुची बाजारभावानुसार दीड लाख रुपये इतकी किंमत आहे. याप्रकरणी रिक्षाचालक खेमराज राठोड (वय१९) याला पोलिसांनी अटक केली. रुग्णवाहिकेच्या चालकाचं दीपक राठोड असं नाव असून तो आठवड्यातून दोनदा रुग्णवाहिकेतून दारू अहमदाबादमध्ये आणायचा, अशी माहिती आरोपी खेमराज राठोड याने पोलिसांना दिली.\nगेल्या वर्षभरापासून दीपक राठोड हा दारु विक्री करण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर करायचा अशी माहिती मिळाली आहे. त्यानं या वर्षभरात किती दारू अहमदाबादमध्ये आणली आहे, याची माहिती दीपक राठोडला अटक केल्यानंतरच मिळू शकेल, असं पोलिसांनी सांगितलं.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगोव्यात घटनेतील तरतुदीनुसार सरकारच अस्तित्वात नाही-काँग्रेस आमदार\nNext articleशांतीदेवी गुप्ता विद्यालयात उन्हाळी क्रीडा शिबिरास प्रारंभ\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा केरळ दौरा, ५०० कोटी रुपयाची मदत जाहीर\nकेरळमध्ये उद्भवलेल्या पूरग्रस्त परिस्थितीस राष्ट्रीय आपत्ती घोषित करा: राहुल गांधी\nविहिरीत सापडला शेतकऱ्याचा मृतदेह\nकेरळच्या मदतीस सरसावले अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, या राज्यांनी केली ‘एवढी’ मदत\nनिम्म्या कर्नाटकवर दुष्काळाचे सावट; मात्र काही भागांत पूरस्थिती\nकाश्‍मीरमधील ग्रेनेड हल्ल्यात एकाचा मृत्यूू, तिघे जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-18T10:54:02Z", "digest": "sha1:H7TCGXMSY3GD6OMMMIEBSQ2TLYJOKFOD", "length": 7205, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "श्रीदेवी यांना मरणोत्तर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बोनी कपूर यांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nश्रीदेवी यांना मरणोत्तर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बोनी कपूर यांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया\nदिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना मरणोत्तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून, ‘मॉम’ या चित्रपटासाठी श्रीदेवी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर त्यांचे पती बोनी कपूर यांनी ट्विट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. बोनी कपूर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “ज्युरींनी ‘मॉम’साठी श्रीदेवींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर केल्याची बातमी कळताच आनंदाला पारावार उरला नाही. हा आमच्यासाठी अतिशय खास क्षण आहे.”\nपुढे त्यांनी म्हंटले आहे की, श्रीदेवी परफेक्शनिस्ट होत्या आणि त्यांच्या 300 चित्रपटांमध्ये ते दिसते. त्या फक्त सुपरअॅक्ट्रेसच नव्हे तर सुपरवाइफ आणि सुपरमॉम होत्या. त्यांच्या आयुष्यातील ही अचिव्हमेंट साजरी करण्याची ही वेळ आहे. आज त्या आमच्यात नाहीत. पण त्यांचा हा वारसा कायम आमच्यासोबत राहिल.” “आम्ही भारत सरकार आणि सन्माननीय ज्युरी मेंबर्सचे आभार व्यक्त करतो. आम्ही श्रीदेवींजींच्या सर्व फ्रेंड्स आणि फॅन्सचे आभार व्यक्त करतो, जे आम्हाला शुभेच्छा पाठवत आहेत.”\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदुसऱ्या टप्प्यातच निगडीपर्यंत मेट्रो\nNext articleकाश्मीरमधील पीडीपी-भाजपा सरकारला कोणताही धोका नाही- राम माधव\nसतिश कौशिकने मागितली बोनी कपूरची माफी\nश्रीदेवी यांच्या अस्थिंचे गंगेत विसर्जन\nबोनी कपूर दोन्ही मुलींसह जाणार हरिद्वारला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z180523090105/view", "date_download": "2018-08-18T09:56:44Z", "digest": "sha1:ZUKZOVPHRCCSVAYGAQ5LXUGVD6ZJ6FMX", "length": 14657, "nlines": 124, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सारस्वत चम्पू - सर्ग १२", "raw_content": "\nअतिथी व अतिथीसत्कार याबद्दल माहिती द्यावी.\nसंस्कृत सूची|संस्कृत साहित्य|पुस्तकं|सारस्वत चम्पू|\nसारस्वत चम्पू - सर्ग १२\nसाकी सर्ग स्थिति लय कारण जगता अनाथ ज्याची शक्ती \nभक्ति नितिच्या आभरणें जो देई सुजना मूक्ति ॥\n देओ भक्तां निजठाया ॥१॥\nसंध्याकाळचा समय, शांत, किरण, तमोहरण भास्कर, नभोभाग उतरत उतरत प्राग्वधूला चुंबन देण्यास सरसावलेला आहे, संध्यारागानें विभुषित झालेली पश्चिम दिशा कनक प्राशन केलेल्या रसपतीप्रमाणें पिंगटवर्णीय भासत आहे, सरस्वतीच्या निर्मल सलिलांत सहस्त्रकिरणाचे कण खेळत आहेत, मंदपवन, मनशांत, तिला आंदोलन देत आहे, अशा वेळी सरस्वतीच्या पूर्वभागावर, प्रचंड ऋषींचा अपूर्व समुदाय एकत्र झालेला दिसूं लागला; उदयाचलावर आरुढ झालेल्या दिनकराप्रमाणें व्यासपीठावर सारस्वतमुनि शोभूं लागला; दिव्य ऋषींच्या मुखचंद्रास पहात पहात सारस्वतमुनीच्या वक्तृत्वसागरास भरती होऊं लागली, तेव्हां --\n आपल्या आकांक्षेप्रमाणें आर्यधर्म म्हणजे काय, हे मी अल्प अधिकारे असून, स्वल्पच शब्दव्याख्येनें सांगणार आहें; धर्म हा शब्द धृ म्हणजे धारण करणें या धातूपासून उत्पन्न झालेला आहे. सर्व प्रजा धर्मानें बद्ध झालेली आहे, हें प्रबुद्ध शास्त्रवेत्यांचे शुद्ध मत आहे; आणि मीमांसाशास्त्राच्या मतानें \"चोदनालक्षणोऽर्था धर्म:\" असें जैमिनी महामुनीचें मत आहे. चोदना म्हणजे प्रेरणा, अर्थात्‍, अर्थात्‍ कोणातरी अधिकारी पुरुषाची आज्ञा, हिलाच धर्म ही संज्ञा आहे; धर्म ही संसारसागरांतील महान नौका आहे; आकाशांतील ग्रहमालेला जसें आकर्षण बंधन आहे, तसेंच मानव जातीला धर्म हें एक बंधन आहे, ऋग्वेदांत \"सुप्रिणितिश्चिकितुषो न शासु:\" म्हणजे विद्वान्‍ चिकित्सक्‍ यांच्या शासनाप्रमाणें प्रियकर अशा अर्थाच्या ऋचा आहेत, अर्थात्‍ धर्माचें शासन हें लोकांस भारी हितकर आहे; .... आतां कांही स्मृतिकारांच्या मताप्रमाणें, धर्माधर्माची व्याख्या, धर्मशास्त्राबरोबर प्रत्यक्ष आणि अनुमान यांच्या विचारानें सारासार पाहून केली पाहिजे. \"प्रत्यक्षचानुमानंच शास्त्रंच विविधागमम्‍ त्रयं सुविदितं कार्यं धर्मशुद्धि ममिप्सता\"..... तसेंच धर्मशास्त्राचा,विचारपूर्वक अर्थनिर्णय करण्याविषयीं वेदवेत्या भारीच तत्परता दाखविलेली आहे. \" तदेव वेदवादीना विचार पूर्वकेऽर्थ निर्णये तात्पर्यातिशय दर्शसर्वोपि वेदार्थे विचारनिर्णयेत व्यइत्यवगम्यते\" अर्थात्‍ सद्‍सद्विवेक बुद्धीस अनुसरुन \" सर्वभूत हितेरत: \" ज्यांत सर्व लोकांचें कल्याण आहे तोच आर्यधर्म म्हणजे श्रेष्ठ धर्म होय ... (टाळ्या). मत्पूज्य सभाजनहो त्रयं सुविदितं कार्यं धर्मशुद्धि ममिप्सता\"..... तसेंच धर्मशास्त्राचा,विचारपूर्वक अर्थनिर्णय करण्याविषयीं वेदवेत्या भारीच तत्परता दाखविलेली आहे. \" तदेव वेदवादीना विचार पूर्वकेऽर्थ निर्णये तात्पर्यातिशय दर्शसर्वोपि वेदार्थे विचारनिर्णयेत व्यइत्यवगम्यते\" अर्थात्‍ सद्‍सद्विवेक बुद्धीस अनुसरुन \" सर्वभूत हितेरत: \" ज्यांत सर्व लोकांचें कल्याण आहे तोच आर्यधर्म म्हणजे श्रेष्ठ धर्म होय ... (टाळ्या). मत्पूज्य सभाजनहो आर्यधर्माची संपूर्ण व्याख्या वर्णन करण्यास, बराच वेळ थोडाच होणार आहे, तर स्वल्पांतच धर्माचीं लक्षणें आणि अंगें सांगून आपला निरोप घेतों.\nधृति क्षमा दमोऽस्तेयं शौचमिन्द्रिय निग्रह: \nधीर्विध्या सत्यमक्रोधो दशकं धर्मलक्षणम्‍ ॥\nया प्रकारची महान्‍ धर्माचीं मुख्य दहा लक्षणें आहेत, तसेंच\nएतं सामासिकं धर्म प्राहु: ....... मनुस्मृति.\nअशी धम्राची पंचागें आहेत. मानसिक धैर्य, क्षमा, इंद्रियदमन, अचौर्य,शुचिर्भूतत्व, शुद्धबुद्धि, अध्ययन, सत्य, अक्रोध, यावर सर्व आर्यधर्माचा पाया आहे, तात्पर्य, ऐहिक आणि पारमार्थिक अभ्युदय करणारा, ज्याच्या योगानें संसारांत सुखाचा उपभोग मिळून मरणोत्तर स्वर्गसुखाची प्राप्ति करुन देणारा, हा आर्यधर्म होय. \" इहलोके सुखं भुक्त्वाचान्तेसत्यपुरं व्रजेत्‍ ..... सारस्वत मुनीच्या मुखांतून निघत असलेला वाग्विहार म्हणजे अमृतमेघाची धार, कीं भोगावतीचा शीतल तुषार अथवा वेदरत्नाकरांतील शब्दमौक्तिकांचे हार यांचीहि उपमा निरुपमाच होणार आहे. तेव्हा ----\nसज्जन मुनिंची सभा भासली निश्चल चित्रासम ती ॥\nवचनसुधा प्राशाया मिळले प्रेक्षकगण नच गणती ॥\n करिती दाटी नभयानीं ॥१॥\nविद्युल्लेखेसम तैं प्रगटे मूर्तिमंत वाग्देवी \nमुनिजन नयनज्योति भ्रमवी विश्वताप जे शमवी ॥\n सुरमुनि इच्छिति शुभ समया ॥१॥\nतेव्हां, सरस्वतीतीरावर आनंदाचें नंदनवन भासूं लागलें, पशुपक्षी यांचें प्रदर्शनच भरलें, मच्छकच्छ विहरुं लागले, लतावल्लरी कुसुमगंध पसरुं लागल्या, सुफलान्वित वृक्ष फळाहार अर्पू लागले, कोकिळा पंचम स्वरांत मंजूळ गायन करुं लागल्या, मूर्तिमंत वेदं स्तवनगुंग झाले, दाहीदिशा नादब्रह्ममय भासूं लागल्या, त्यावेळीं ---\nश्रीजगदंबा विश्वकदंबा सारस्वत जननी \nप्रसन्नवदना तोषित सुमना सुरवर मुनि नमनीं ॥\nवरदहस्त शुभकारक सादर सत्वर वर करुनी \nपवन सुधाकर वसुधामरपद वंदित मृदु वचना ॥१॥\nसरस्वती जल नदीतटाकीं तपती मद्भजनीं \nप्रसन्न त्यांना सदा असें मी तत्पर वरदानी ॥\nधर्मनीति बल पुण्यप्रभावें मान्य सदा सुजनीं \nसारस्वत श्रुतिमार्ग प्रकाशक पावन अभिधानी ॥२॥\nअमर कुसुम घन वर्षति झाली सारस्वती सुमनवृष्टी \nसज्ञान पर्वणी ते दिसली आनंदमग्निका सृष्टि ॥१॥\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.tarunbharat.com/news/600536", "date_download": "2018-08-18T10:26:25Z", "digest": "sha1:5KUGOERXRRTZB6EWVKB3OC7PHQKVBQ6C", "length": 10061, "nlines": 53, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वादळी वाऱयांसह ‘तरणा’ धुवाँधार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » वादळी वाऱयांसह ‘तरणा’ धुवाँधार\nवादळी वाऱयांसह ‘तरणा’ धुवाँधार\nरत्नागिरी ः शहरानजीकच्या मिरजोळे हनुमाननगर येथे सोसाटय़ाच्या वाऱयाने घराच्या छप्पराचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले.\nजिल्हय़ात अनेक ठिकाणी घरांची पडझड\nजी. जी. पी. एस. चे पत्रे उडाले\nलांजात धाब्यात घुसले पुराचे पाणी\n‘पुर्नवसू’ (तरणा) नक्षत्रामध्ये जिल्हावासीयांना चांगलाच दणका दिला असून गुरूवारी सोसाटय़ाच्या वादळी वाऱयांसह झालेल्या धुवाँधार पावसाने विविध ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या. रत्नागिरीतील जीजीपीएस शाळेच्या छपराचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले, त्यामुळे दुपारच्या सत्रातील शाळेला सुटी जाहीर करण्यात आली. लांजातील बेनी नदीला पूर आला असून त्याचे पाणी हॅप्पी पंजाबी धाब्यात घुसले. ठिकाणी घर व गोठय़ांचे नुकसान होऊन त्यात लाखोंची हानी झाली. पावसाचा जोर 15 जुलैपर्यंत कायम राहील असा अंदाज हवमान खात्याने व्यक्त केला आहे.\nनक्षत्रावरून पावसाच्या अंदाजाला विज्ञानाचा आधार नाही आणि विज्ञानाच्या आधारे सांगितलेले पावसाचे अंदाजही किती चुकीचे ठरतात, याचाही दरवर्षी प्रत्यय येत असतो. जुनी माणसं नक्षत्रावरून पावसाचे ठोकताळे बांधायचे. आर्द्रा, पुर्नवसू, पुष्य, हस्त ही नक्षत्रे धुवाँधार बरसतात, असे सांगितले जाते. पण अलिकडे पावसाचा लहरीपणा नक्षत्राप्रमाणे दिसून येत नाही.\nसध्या पुर्नवसू (तरणा) चा चांगलाच जोर सर्वत्र जाणवत आहे. रत्नागिरीत या नक्षत्राने झोडपून काढले आहे. जिल्हय़ात खेड, संगमेश्वर, लांजा, रत्नागिरी, राजापूर या तालुक्यात अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडत आहेत. जिल्हय़ात गुरूवारी 12 जुलै रोजी सकाळपर्यंत झालेल्या 24 तासात सरासरी 57.67 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे हनुमाननगर येथे यादिवशी सकाळी सोसाटय़ाच्या वाऱयाने एका घराचे पत्र्याचे छप्पर उडून मोठे नुकसान झाले.\nजी.जी.पी.एस. प्रशालेल्या इमारतीच्या छपरावरील पत्रे वादळी वाऱयामुळे उडून मोठे नुकसान झाले. गुरूवारी सकाळच्या सत्रात सोसाटय़ाच्या वाऱयांमुळे ही घटना घडली. यावेळी फॅनही तुटून वर्गात पडल्याचे समजते. सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्याला दुखापत झालेली नाही. मुख्याध्यापकांच्या केबीनवरील पत्रेही उडून गेले. या घटनेनंतर दुपारच्या सत्रातील शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली. दरम्यान शुक्रवारीही अशीच परिस्थिती असल्यास विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये अशा सूचना शाळा प्रशासनाने केल्या आहेत.\nजिल्हय़ात पडलेल्या पर्जन्यमानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे (मिमी मध्ये)ः\nमंडणगड – 52, दापोली -20, खेड 52, गुहागर-6.00, चिपळूण -80, संगमेश्वर-75, रत्नागिरी-52, लांजा -98, राजापूर-84\nबेनी नदीचे पाणी घुसले हॅपी ढाब्यात\nमुसळधार पावसामुळे लांजातील बेनी नदीला आलेल्या पुराचे पाणी शहरानजीकच्या जुन्या हॅपी ढाब्यात घुसले असून कुवेतील सखल भागात पाणी साचले होते.\nगुरूवारी सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने दुपारच्या काही काळाचा अपवाद सोडता सायंकाळपर्यंत सातत्य राखले. तालुक्यातील बहुतेक सर्वच नद्यांना पूर आला होता. बेनी नदीला आलेल्या पुराचे पाणी जुना हॅपी ढाब्यामध्ये घुसले. मात्र वेळीच दक्षता घेतली गेल्याने नुकसान टळले. कुवेतील काही सखल भागात पाणी साचले होते.\nवृक्ष लागवडीची जबाबदारी आता सरपंचांवर\nनोकरीचे आमिष दाखवून पोलिसाच्याच मुलाला गंडवले\nअखेर वनविभागाने इसा हळदेच्या मुसक्या आवळल्या\n‘हिमोफिलिया’ इंजेक्शन उसनवारीने घेण्याची वेळ\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-18T10:53:50Z", "digest": "sha1:LBQ24RZJGK6PB7MUEIBOGR6XG755KEJ6", "length": 12919, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“मिशन’ प्लास्टिक, थर्माकोलमुक्‍त उद्योगनगरी! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“मिशन’ प्लास्टिक, थर्माकोलमुक्‍त उद्योगनगरी\nपिंपरी – महाराष्ट्र राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या दिवशी प्लास्टिक आणि थर्माकोलवर बंदी घातली. न्यायालयाने देखील या निर्णयास योग्य ठरवत बंदी कायम ठेवली. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पर्यावरण संवर्धन समितीने प्लास्टिक आणि थर्माकोलमुक्‍त शहराचे मिशनफ हाती घेतले आहे. या मोहिमेला 19 एप्रिलपासून सुरुवात होणार असून 21 एप्रिल दरम्यान चालणाऱ्या या मोहिमेत प्लास्टिक, थर्माकोल संकलनाबरोबरच जनजागृती करण्यात येणार आहे.\nमहाराष्ट्र राज्य सरकारने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016 अन्वये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल (पॉलिस्टायरिन) व प्लास्टिकपासून बनविण्यात येणाऱ्या व एकदाच वापरल्या जाणाऱ्या डिस्पोजेबल वस्तू उदाहरणार्थ ताट, कप्स, ग्लास, काटे, वाटी, चमचे, भांडे इत्यादीं, हॉटेल्समध्ये अन्न पदार्थ पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक भांडे व वाटी, स्ट्रॉ, नॉन वोवन पॉलिप्रॉपीलीन बॅग्ज, द्रव पदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे प्लास्टिक पाऊच/कप, अन्नपदार्थ, धान्य साठविण्यासाठी व पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक व प्लास्टिक वेष्टन या सर्व वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच सजावटीसाठी देखील प्लास्टिक व थर्माकोलच्या वापरावर बंदी घातली आहे. याविरोधात प्लास्टिक उत्पादन न्यायालयात गेले. मात्र, न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवत मुदत दिली आहे.\nया पार्श्‍वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका आणि पर्यावरण संवर्धन समितीने प्रभागनिहाय मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार गुरुवारी सकाळी नऊ ते बारा दरम्यान क आणि इ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत भोसरी, मोशी, मासुळकर कॉलनी, नाशिक रोड भोसरी, दिघी रोड, लांडेवाडी बोपखेल, चऱ्होली, मोशी या ठिकाणी प्लास्टिक व थर्माकोल कचऱ्याचे संकलन केले जाणार आहे. अ, ब, क व फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत शुक्रवार (दि. 20) भेळ चौक निगडी प्राधिकरण, एमआयडीसी चिंचवड, मोरवाडी कॉलनी, आनंदनगर चिंचवड, काळभोरनगर, लिंकरोड चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, चाफेकर चौक, रावेत, लोकमान्य टिळक चौक निगडी, कृष्णानगर चिखली, रुपीनगर, तळवडे येथे प्लास्टिक व थर्माकोल संकलन केले जाणार आहे. ड, ग व ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत शनिवारी (दि. 21) औंध-रावेत रोड रहाटणी, रहाटणी रोड पिंपळे सौदागर, मनपा दवाखान्याजवळ पिंपळे गुरव, वाकड गावठाण, थेरगाव, डांगे चौक, काळेवाडी, कासारवाडी, संत तुकारामनगर, फुगेवाडी, दापोडी, सांगवी, नवी सांगवी येथे प्लास्टिक व थर्माकोल संकलन केले जाणार आहे.\nपर्यावरण संवर्धन समितीने शहरातील नागरिकांना या उपक्रमात स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. तसेच दि. 19 ,20 आणि 21 एप्रिल 2018 रोजी प्रत्येकाने आपल्या कडे साठवून ठेवलेले चांगले अथवा खराब प्लास्टिक एकत्रित करून आपल्या घराच्या नजदीकच्या संकलन केंद्रावर आणून द्यावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. जे व्यापारी अथवा हातगाडीवाले पर्यावरण संवर्धनाच्या विचार प्रवाहांपासून दूर आहेत त्यांना जागृत करण्याबरोबरत त्यांच्याकडील प्लास्टिक जमा करण्यासाठी स्वयंसेवक नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.\nप्लास्टिक वापरावर आलेली बंदी आपण आजपर्यंत केलेल्या प्लास्टिक वापराच्या अतिरेकाची परिणीती आहे. विशेषतः आपले जलसाठे व जमीन यांचे पर्यावरण प्रदूषित होत चालले आहे. हवेतील प्रदूषणही प्रचंड प्रमाणात वाढले आहे. आपल्या सवयी बदलून व शासनाने लागू केलेल्या प्लास्टिक बंदी कायद्याला अनुसरून आचरण करावे. आपल्याकडील प्लास्टिक व थर्माकोल संकलन केंद्रांवर जमा करावे. प्लास्टिक व थर्माकोलमुक्त शहरासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे.\n– विकास पाटील, अध्यक्ष, पर्यावरण संवर्धन समिती.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचांदणी चौकातील भूसंपादनाला पुन्हा ‘ब्रेक’\nNext article‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेसाठी 120 प्रस्ताव\nपादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा\n“आषाढघन’ काव्‍यसुमनांच्‍या वर्षावात रसिक चिंब\nVideo : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात आगमन\nशहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल\nपालखीसोबत 225 जणांची सायकलवारी\nवारीतील भाविकांना आरोग्य सुविधा पुरवण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/health-education-tax-free-46414", "date_download": "2018-08-18T10:53:01Z", "digest": "sha1:GKMVTESXV5QWI423VJXFPXJM2TFHXUZK", "length": 14474, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Health, Education tax free आरोग्य, शिक्षण करमुक्त | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 20 मे 2017\nदूरसंचार आणि वित्तीय सेवांसाठी 18 टक्के कर आकारण्यात येईल. वाहतूक सेवेवर 5 टक्के असेल. ओला आणि उबर यांसारख्या ऑनलाइन प्रवासी टॅक्‍सी कंपन्या सध्या 6 टक्के कर भरतात. विनावातानुकूलित रेल्वे प्रवासाला करसवलत देण्यात आली असून, वातानुकूलित रेल्वे प्रवासावर 5 टक्के कर असेल\nश्रीनगर - वस्तू व सेवाकर (जीएसटी) रचनेतून आरोग्यसुविधा आणि शिक्षण या सेवा वगळण्यात आल्या आहेत. \"जीएसटी' परिषदेच्या बैठकीत शुक्रवारी सेवांची करनिश्‍चिती करण्यात आली. वस्तूंप्रमाणेच चारस्तरीय कररचना सेवांसाठी अंतिम करण्यात आली. जीएसटी परिषदेने सेवांसाठी 5, 12, 18, 28 टक्के चारस्तरीय रचना अंतिम केली. यात दूरसंचार विमा, हॉटेल आणि रेस्टॉरन्ट या महत्वाच्यया सेवांचे कर निश्‍चित करण्यात आले आहेत.\nदोन दिवसीय परिषदेच्या समारोपानंतर आज पत्रकारांशी बोलताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, \"\"दूरसंचार आणि वित्तीय सेवांसाठी 18 टक्के कर आकारण्यात येईल. वाहतूक सेवेवर 5 टक्के असेल. ओला आणि उबर यांसारख्या ऑनलाइन प्रवासी टॅक्‍सी कंपन्या सध्या 6 टक्के कर भरतात. विनावातानुकूलित रेल्वे प्रवासाला करसवलत देण्यात आली असून, वातानुकूलित रेल्वे प्रवासावर 5 टक्के कर असेल. मेट्रो, लोकल आणि धार्मिक पर्यटनालाही \"जीएसटी'तून सवलत देण्यात आली आहे.\nइकॉनॉमी क्‍लासच्या विमान प्रवासावर पाच टक्के, तर बिझनेस क्‍लासच्या विमान प्रवासावर 12 टक्के कर आकारण्यात येईल. विनावातानुकूलित रेस्टॉरन्टमधील खाद्यपदार्थांच्या बिलावर 12 टक्के कर असेल. वातानुकूलित तसेच, मद्यपरवाना असलेल्या रेस्टॉरंटसाठी हा कर 18 टक्के असेल. पंचतारांकित हॉटेलांसाठी हा कर 28 टक्के असणार आहे. पन्नास लाख रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या रेस्टॉरंटसाठी 5 टक्के कर असेल. लॉंड्रीसारख्या कामांसाठी 12 टक्के कर असणार आहे.\nप्रतिदिन दररोज एक हजार रुपयांपर्यंत भाडे आकारणाऱ्या हॉटेल आणि लॉजेसला जीएसटीतून वगळण्यात आले आहे. प्रतिदिन एक ते दोन हजार रुपये भाडे आकारणाऱ्या हॉटेल आणि लॉजेससाठी 12 टक्के कर असेल. याचवेळी अडीच ते पाच हजार रुपये भाडे आकारणाऱ्या हॉटेलांना 18 टक्के कर आकारण्यात येईल. पाच हजार रुपयांपेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या हॉटेलांवर 28 टक्के कर असेल. लॉटरीवर कर असणार नाही. फ्लिपकार्ट, स्नॅपडिल यासारख्या ई-कॉमर्स कंपन्या वितरकाला पैसे देताना एक टक्का उद्गम कर कपात करतील, असे सूत्रांनी सांगितले.\nसोन्यासाठी 3 जूनला बैठक\n\"जीएसटी' रचनेतील वस्तूंचे कर काल (गुरुवारी) निश्‍चित करण्यात आले होते. मात्र, सोन्यासह काही मौल्यवान वस्तूंचे दर अद्याप निश्‍चित होऊ न शकल्याने त्यावर \"जीएसटी'ची 1 जुलैला अंमलबजावणी होण्यापूर्वी निर्णय होईल. यासाठी जीएसटी परिषदेच्या बैठक 3 जूनला पुन्हा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nघरकामगार, बांधकाम मजूर महिलांची उपेक्षाच\nजळगाव : दिवसरात्र काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, पण डोक्‍यावर हक्काचं छत नाही...सतत कष्ट करूनही पदरी काहीच न पडल्यामुळे अनेकदा उपवास...\nडिजिटायझेशन'ने दुर्मिळ ग्रंथही चिरकाल \nजळगाव ः पुस्तकांचा खजिना सांभाळणाऱ्या अनेक वाचनालयांना शतकोत्तरी परंपरा लाभलेली आहे. परंतु काळानुरूप ग्रंथालयांनी तंत्रज्ञानाशी जुळवून, त्या दिशेने...\nताडगाव - मोफत आरोग्य शिबिरात गरिब व आदिवासी नागरीकांनी घेतला लाभ\nपाली - सुधागड तालुक्यातील ताडगाव येथे गुड डुअर्स चैरिटीज मुंबई, टिकेडिके परिसर विकास संघर्ष समिती आणि जय भैरवनाथ युवा मित्र मंडळ ताडगांव यांच्या...\nविद्यार्थ्यांची जबाबदारी शिक्षकांबरोबर पालकांचीही - प्राध्यापक पंकज गावडे\nनवी सांगवी (पुणे) - \" चारित्र्यवान साने गुरूजींचे जीवन हे त्यांच्या शिक्षकांबरोबर त्यांची वात्सल्यसिंधु आईच्या संस्कारामुळे घडले, त्यामुळे...\nसमस्या सोडवण्यासाठी नाशिकला भरणार शिक्षकांचा दरबार\nयेवला - शिक्षकांच्या विविध रखडलेल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी नाशिकमध्ये विभागातील शिक्षकांचा शिक्षक दरबार गुरुवारी (ता.२३) आयोजित करण्यात आला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/01/", "date_download": "2018-08-18T10:51:16Z", "digest": "sha1:DH7WBLQZNFPQSLGTKLJJ2QHLR5PL2HXE", "length": 10028, "nlines": 189, "source_domain": "kayvatelte.com", "title": "January | 2009 | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nकाही लोकं भेटतात, आणि एकदम जवळचे मित्र कधी होऊन जातात तेच कळत नाही. मैत्री होण्यासाठी रोज भेट होणे किंवा रोज फोनवर गप्पा झाल्याच पाहिजे असं नाही. एखादी लहानशी भेट पण पुरेशी ठरते. कामाच्या संदर्भात मध्यंतरी आसामला आणि मेघालयाला गेलो होतो. … Continue reading →\nमुलींना किंवा बायकोला काही खरेदी करायची असेल तर एक हक्काचा ड्रायव्हर म्हणून आणि शांतेचं कार्टं या नाटकातल्या टकलू हमाल -प्रमाणे मी सोबती ला असतो.. म्हणजे पिशव्या धरायला. जे काही महत्वाचे निर्णय म्हणजे जांभळी वांगी चांगली की हिरवी \nतुमच्या नावाचं सर्च इंजिन..\nगुगलच्या ऐवजी तुमच्या नावाचं म्हणजे गुगल च्या ऐवजी तुमचे नांव असलेले सर्च इंजिन जर मिळालं तर सहज शक्य आहे. खाली दिलेल्या पेज वर ( चित्रावर) क्लीक करा आणि फिल इन द ब्लॅंक्स च्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा. बस्स सहज शक्य आहे. खाली दिलेल्या पेज वर ( चित्रावर) क्लीक करा आणि फिल इन द ब्लॅंक्स च्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा. बस्स\nPosted in कम्प्युटर रिलेटेड\t| Tagged कम्प्युटर\t| 4 Comments\nसेम सेक्स लव्ह इन इंडिया..होमोसेक्स्युअलिटी – …\nहिंदुस्थान टाइम्स मधला एक लेख आहे , रुथ वनिता आणि सलिम किडवई ह्यांच्या पुस्तकाचे स्वैर परिक्षण आहे ते, ह्या दोघांनी लिहिलेल्या पुस्तकाचे- सेम सेक्स लव्ह इन ईंडिया. ( (या पुस्तकाचे परिक्षण लेखक अशोक रावकवी आहे )) मनाला बोचणारा एक उल्लेख … Continue reading →\nPosted in सामाजिक\t| Tagged अशोक राव कवी, होमोसेक्युअलिटी\t| 8 Comments\nकिती पगार म्हणजे पुरेसा पगार\nसमजा मन्थली ग्रॉस सॅलरी १ लाख रुपये आहे आता आपण खर्च बघू… इन्कम टॅक्स ३३०००/- रु. घराचा हप्ता.. ३००००/- रु. (खर्च टोट्ल.. ६३०००/- रु.) पेट्रोल खर्च,, ७००००/रु. ( खर्च टोटल ८५०००/-रु) खाणे पिणे रशन वगैरे फळं, भाज्या, दुध, शाळेची फिस, … Continue reading →\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nसिक्रेट मेसेज कसा पाठवायचा\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.tarunbharat.com/news/category/editions/satara", "date_download": "2018-08-18T10:24:20Z", "digest": "sha1:YE6GY4WGSTHVM5JCU42RRSH4BJBFYOBT", "length": 9384, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सातारा Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nकोयनेने धोक्याची पातळी गाठली\nप्रतिनिधी/ नवारस्ता गेल्या दोन दिवसांपासून कोयना पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर वाढत असल्याने पाणलोट क्षेत्रातून मोठय़ा प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे धरणातील निर्धारित पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी गुरुवारी सकाळी धरणाचे सहा वक्र दरवाजे सहा फुटांवर उचलून कोयना नदीपात्रात 49 हजार 943 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. गुरुवारी रात्रीच कोयना नदीने धोक्याची पातळी गाठली आणि कोयना नदीवरील महत्वपूर्ण असलेला ...Full Article\nप्रतिनिधी/ वाई धोम धरणातून 5 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कृष्णा नदीतून सुरु असल्याने सध्या कृष्णा नदी दुथडी पाण्याने भरुन वाहु लागली आहे. सध्या महागणपती मंदिराच्या पायऱयांना पाणी लागले असून ...Full Article\nरयतच्या अनुकंपाखालील नियुक्तीसाठी प्रयत्न करु\nप्रतिनिधी/ सातारा रयत शिक्षण संस्थेतील अनुकंपा तत्वाखालील पदे भरण्याबाबत जो विलंब लागला आहे तो, अन्यायकारक आहे. जे बांधव व भगिनी अनुकंपा तत्वाखाली नोकरी मिळण्यासाठी लढत आहेत, त्यांच्या पाठीशी मी ...Full Article\nपर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करुन धरणीला वाचवा\nप्रतिनिधी/ सातारा भारत हा देश विविध परंपरा आणि सण उत्सवांचा देश म्हणून ओळखला जातो. आपल्या अलौकिक संस्कृतीचे जतन करतानाच सण आणि उत्सव पर्यावरणपूरक पध्दतीने साजरे करा. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा ...Full Article\nवाहतूक कोंडी गेली पोलिसांच्या हाताबाहेर\nप्रतिनिधी/ सातारा सातारा शहरातील अत्यंत महत्वपूर्ण समजला जाणारा पोवईनाका परिसरात सध्या गेडसेपरेटरच्या कामाने वेग घेतल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बटय़ाबोळ झाला आहे. येथील वाहतूक व्यवस्थेत वारंवार बदल करुन वाहतूक नियंत्रक ...Full Article\n मुलांना किती पॉकेट मनी द्यावा याचा विचार करायला हवा\nलुनेश विरकर/ म्हसवड आजच्या काळात प्रत्येक विद्यार्थ्यांला पॉकेटमनी हवा असतो. ती गरज देखील आहे. मात्न हे विद्यार्थी या पॉकेटमनीचा वापर कुठे करतात. तो ज्यासाठी दिला जातो तो तिथे ...Full Article\nउरमोडीचे पाणी लवकरच पिंगळी तलवात पोहचणार…\nवार्ताहर/ औंध गेली कित्येक वर्षे पिंगळी तलाव (ता.माण) उरमोडीच्या पाण्यासाठी असुसलेला होता. मात्र, तथाकथीत माणच्या नेतेमंडळींनी दबाबतंञाचा वापर करीत प्रशासनास वेठीस धरीत उरमोडीचे पाणी पिंगळी तलावात येण्यासाठी मार्डीच्या पोळ ...Full Article\nकंपनी बंद पाडण्याचा प्रयत्न करणाऱया कामगारांना अटक\nप्रतिनिधी/ खंडाळा कंपनीत जाणाऱया, बाहेर येणाऱया कामगारांना शिवीगाळ, दमदाटी, आतमध्ये जाण्यास अटकाव करुन कंपनी बंद पाडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन पुरुष व नऊ महिलांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयासमोर ...Full Article\nकंपनीच्या अकांऊंटमधून 37 लाखाची चोरी\nप्रतिनिधी/ सातारा मोळाचा ओढा येथील अभिजित इक्विपमेंट व अभिजित इंजिनिअर्स कंपनीच्या मॅनेजरला मोबाईलवर एक मेसेज आल्यानंतर त्या मेसेजवर फोन लावताच कंपनीचे चक्क 37 लाख 78 हजार रुपये त्रयस्थाच्या खात्यावर ...Full Article\nकोयनेचे दरवाजे अडीच फुटाने उघडले\nप्रतिनिधी/ नवारस्ता कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असल्याने कोयना धरणात येणारी पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे मंगळवारी धरणाचे सहा वक्र दरवाजे अडीच फूट उचलून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद ...Full Article\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9A/", "date_download": "2018-08-18T10:52:25Z", "digest": "sha1:LBXVGV4VTEOXXCCPXZ2MABBDAB2UTSMG", "length": 10744, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सेवारस्त्यांवर वाहतुकीचा ताण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपालिकेच्या उदासिनतेमुळे अतिक्रमणांमध्ये वाढ\nसातारा- पोवई नाक्‍यावर ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे शहरातील मुख्य रस्त्यापेक्षा सेवा रस्त्यावरील ताण प्रचंड वाढला आहे. हॉटेल महाराजाच्या पिछाडीला मोनार्क हॉटेल ते आयडीबीआय बॅंक कॉर्नरच्या मार्गावर वाहतुकीला टपऱ्यांचा अडथळा होऊ लागला आहे. या अतिक्रमणांना पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या कानपिचक्‍या मिळाल्यानंतरही सातारा पालिका लक्ष देणार का हा खरा मुद्दा आहे. पालिकेच्या उदासीनतेमुळे महाराजा हॉटेलच्या पिछाडीला अतिक्रमणे गाजर गवतासारखी वाढली आहेत. राजकीय दबावाला भीक न घालता ही अतिक्रमणे तातडीने हटवल्यास शहरातील वाहतुकीची कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.\nपोवई नाक्‍यावर सुरू झालेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. त्यामुळे गेल्या महिन्यापासून सुरू असलेली सातारा शहराची एकेरी वाहतूक व्यवस्था शिथिल करण्यात आली आहे. शहराच्या पूर्वेकडून गोडोली मार्गे पोवई नाक्‍यावरून स्टॅन्डला जाण्यासाठी मोनार्क चौक शाहू चौक रविवार पेठेतून शिक्षक बॅंक मार्ग हुतात्मा उद्यानाकडे जाण्याचा द्रविडी प्राणायम करावा लागत आहे. मोनार्क चौकातच रिक्षा स्टॅन्ड तसेच शाहूनगरकडे जाण्यासाठी तो एकमेव मार्ग असल्याने वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. तिथे वाहतूक कर्मचारी अथवा सिग्नल यंत्रणा नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. मात्र या कोंडीला या परिसरात अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या टपऱ्या कारणीभूत आहे. साताऱ्यात फळकूट दादांच्या आश्रयाने टपऱ्या उभ्या राहिल्यात ही वस्तुस्थिती आहे. मोनार्क चौकातल्या टपऱ्यांचा गॉडफादर कोण हे समजायला मार्ग नाही. मात्र, या अतिक्रमणांकडे पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष आहे हे नक्की.\nअतिक्रमण हटावचा फार्स पुरे झाला\nसाताऱ्यात अतिक्रमण हटाव मोहिम हा चेष्टेचा विषय झाला आहे. तुम्हाला आमचचं अतिक्रमण दिसत का या राजकीय ब्रह्मास्त्राचा वापर करून पालिकेची यंत्रणा गुंडाळली जाते. सुरूची, जलमंदिर या दोन सत्ताकेंद्राची नावे पुढे केली की राजकीय अभय मिळते हा सातारकरांचा पक्का समज आहे. शहरातून गोडोली मार्गे येऊन शहरात येण्यासाठी हॉटेल महाराजाच्या पिछाडीचा रस्ता हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे येथील टपऱ्यांची अतिक्रमणे काढावीत असा दबाव पालिकेवर वाढू लागला आहे. वाहतूक विभागानेसुध्दा तसे पत्र पालिकेला दिल्याचे समजते. पालकमंत्री विजय शिवतारे यांनी अतिक्रमणाच्या प्रश्नावरून पालिकेचे वेळोवेळी कान उपटले त पण पालिकेने हीच गंभीर बाब कानामागे टाकली आहे.\nहॉटेल महाराजाच्या पाठीमागील भागात अंर्तगत वाहतूक वाढली आहे. येथील अतिक्रमणे तत्काळ काढण्यासंदर्भात संबधित अतिक्रमण हटाव पथकाला सूचना देण्यात येतील\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवाई: स्वच्छता अभियानाने आंबेडकर अनुयायांनी केले महामानवाला अभिवादन\nNext articleइजिप्तमध्ये घातपाताचा कट उधळला…\nराजवाडा चौपाटीवरील फ्लेक्‍स बोर्डमुळे झाडं सोसतायत मरणयातना\nरेल्वे अपघात एकाचा मृत्यू, घातपाताचा संशय\nजिल्ह्यात दूध संकलनात वाढ आंदोलनाची धार झाली कमी\nहुतात्मा स्मारके प्रेरणास्थळ बनावीत\nजिल्ह्यात कमी निधीमध्ये अधिक सिंचनाचे काम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathiinfopedia.co.in/2018/08/09/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-18T09:56:18Z", "digest": "sha1:L2DKNLOH2BVHKW7Y7BW6M4HCLYYIWVCK", "length": 11680, "nlines": 154, "source_domain": "marathiinfopedia.co.in", "title": "अलंकार - MARATHI INFOPEDIA", "raw_content": "\nअलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा आहे. दागिने घातल्यावर माणसाच्या शरीराला शोभा येते. तसेच लेखक कवी आपल्या मनातील आशय सुंदर, आकर्षक शब्दांतून, विविध कल्पनांनी सजवून व्यक्त करतात. यालाच आलंकारिक भाषा म्हणतात. अलंकार हा मुळातले सौंदर्य वाढवणारा घटक आहे.\nढगांशी वारा झुंजला रे\nकाळाकाळा कापुस पिंजला रे\nआतां तुझी पाळी, वीज देते टाळी\nभाषेला ज्याच्या – ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना ‘भाषेचे अलंकार’ असे म्हणतात. केव्हा दोन वस्तूंतील साम्य दाखवून, तर केव्हा विरोध दाखवून , केव्हा नाद निर्माण करणारे शब्द वापरुन, तर केव्हा एखादी कल्पना वाजवीपेक्षा अधिक फुगवून सांगून आपण आपली भाषा अधिक सुंदर किंवा पारिणामकारक करण्याचा प्रयत्न करतो. केव्हा शब्दांतील अक्षररचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते तर केव्हा योजिलेल्या शब्दांमुळे अर्थांचे सौदर्य खूलून दिसते.\nभाषेच्या अलंकारांचे दोन प्रकार होतात.\nशब्दालंकार अलंकाराचे उपप्रकार आहेत ते पुढीलप्रमाणे :\nजेव्हा एखाद्या वाक्यात किंवा पद्यचरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे सौंदर्यनिर्मिती होते, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.\nपेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी \nगळ्यामध्ये गरिबाच्या गाजे संतांची वाणी \nजेव्हा पद्यचरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने येतात, तेव्हा यमक अलंकार होतो.\nवाक्यात किंवा पद्यचरणात एकच शब्द दोन किंवा दोहोंपेक्षा जास्त अर्थांनी वापरल्यामुळे शब्दचमत्कृती साधली जाते, तेव्हा श्र्लेष अलंकार होतो.\n(a) हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस.\n(b) शंकरासी पूजिले सुमनाने.\nअर्थालंकार अलंकाराचे काही उपप्रकार पुढीलप्रमाणे :-\nदोन वस्तूंतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने जेथे वर्णन केलेले असते तेथे ‘उपमा’ हा अलंकार होतो.\n(a) पिठासारखे स्वच्छ चांदणे पडले होते.\n(b) सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी \nउत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. ज्या दोन वस्तूंची आपण तुलना करतो त्यांतील एक (उपमेय) ही जणू काही दुसरी वस्तू (उपमान) च आहे अशी कल्पना करणे याला उत्प्रेक्षा म्हणतात.\n(2) सतेज डोळे चमचम करती जणुं रत्नें गोजिरी.\nउपमेय व उपमान यांत एकरुपता आहे. ती भिन्न नाहीत असे वर्णन जेथे असते तेथे रुपक हा अलंकार असतो.\n(2) जग ही एक रंगभूमी आहे.\nउपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे जेव्हा वर्णन केले असेल तेव्हा ‘व्यतिरेक ‘ हा अलंकार होतो.\n(1) सांज खुले सोन्याहुनी पिवळे हे पडले ऊन \n(2) सावळा ग रामचंद्र \n चंद्र आभाळी लोपतो ॥\nएखाद्या व्यक्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे त्याच्या स्वाभाविक स्थितीचे किंवा हालचालीचे यथार्थ (हुबेहुब) पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन हाही एक भाषेचा अलंकार ठरतो, याला स्वभावोक्ती अलंकार असे म्हणतात.\nचिमुकली पगडी झळके शिरी,\nचिमुकली तरवार धरी करी;\nचिमुकला चढवी वर चोळणा;\nचिमुकला सरदार निघे रणा.\nएखाद्या गोष्टीचे वर्णन करून झाल्यावर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत अलंकार होतो.\nलहानपण दे गा देवा \nज्या ठिकाणी एखादी गोष्ट किंवा घटना सांगताना तिचे अवास्तव वर्णन केले जाते व त्यामुळे त्यातील असंभाव्यता स्पष्ट होते, अशा ठिकाणी अतिशयोक्ती अलंकार होतो.\nकाव्य अगोदर आले नंतर जग झाले सुंदर \nरामायण आधी मग झाला राम जानकीवर ॥\nनिसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करुन ती मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे जेथे वर्णन असते तेथे ‘चेतनगुणोक्ती’ हा अलंकार असतो.\nझडकरि मग बोले शेवंती ती उठून\n“मजसम जगतीं या फुल नाहींच अन्य\nसुबकचि पिवळा हा रंग माझा पहा ना\nमधुर मम सुगंधा कोण घे ना शहाणा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://shatadapremkarave.blogspot.com/2009/05/blog-post_22.html", "date_download": "2018-08-18T10:48:15Z", "digest": "sha1:NLIN2WQPP7GOA2CWPD6SHPG5FWOMMELS", "length": 2167, "nlines": 47, "source_domain": "shatadapremkarave.blogspot.com", "title": "शतदा प्रेम करावे: ज्ञानेश्वर", "raw_content": "\nनमस्कार मित्रानो. मी अनिल बिहाणी . मझ्याबाबातीत सांगण्यासारखे विशेष काहिच नाहि.मी एक् सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य मुलगा आहे.पण प्रत्येक समान्यात कुठे तरि असामन्यत्व द्डलेलं असतं.माझ्यातल्या या असामान्यत्वाचा शोध् घेणे सद्या सुरु आहे.\nसुख कुणाचे दुःख कुणाचे\nराग कुणाचा लोभ कुणाचा\nहे तर सारे आपुले माझे\nमागतो मी पसायदान जे\nहे तर सारे तुमचे तुम्हा\nअभंग अजुनही गाते मुक्ता\nदार कशास उघडावे मी \nआसवास हे पाणी म्हणती\nजय हो तेरी गोविंदा ......\nही वाट दूर जाते .......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0", "date_download": "2018-08-18T09:58:56Z", "digest": "sha1:CPGDSGLV2BQ2JHVG3IHNPKV3ESNRFCR3", "length": 5616, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ट्रफाल्गर स्क्वेअर - विकिपीडिया", "raw_content": "\nट्रफाल्गर स्क्वेअर (इंग्लिश: Trafalgar Square) हा लंडन शहरामधील एक चौक व लोकप्रिय पर्यटक आकर्षण आहे. मध्य लंडन भागातील सिटी ऑफ वेस्टमिन्स्टर ह्या बरोमधील चेरिंग क्रॉस ह्या ऐतिहासिक भागात बांधला गेलेला ट्रफाल्गर स्क्वेअर हे लंडनमधील सर्वात प्रसिद्ध खुणांपैकी एक मानले जाते.\nइ.स. १८०५ सालच्या नेपोलियोनिक युद्धांमधील ट्रफाल्गरच्या लढाईचे स्मारक म्हणून हा भाग बांधला गेला आहे. सध्या अनेक शासकीय तसेच पब्लिक सभा, मेळावे, उत्सव इत्यादींसाठी ट्रफाल्गर स्क्वेअरचा वापर होतो.\nट्रफाल्गर स्क्वेअर, इ.स. १९०८\nट्रफाल्गर स्क्वेअर, इ.स. २००९\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१६ रोजी ०९:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://manashakti.org/index.php?q=mr/samshodhan/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A8", "date_download": "2018-08-18T10:09:25Z", "digest": "sha1:PG4YE7WD3EH4KL677GXSTU7VRINTSQ5T", "length": 8749, "nlines": 95, "source_domain": "manashakti.org", "title": "बुद्धिनिष्ठ प्रार्थनेचा, गर्भावर आणि मातेवर होणारा परिणाम: एक संख्यात्मक दृष्टिकोन | Manashakti Research Centre", "raw_content": "\nयेथे सातत्यपूर्ण मनःशांती मिळवण्याच्या सोप्या व व्यावहारीक उपायांची माहिती आहे.\nबुद्धिनिष्ठ प्रार्थनेचा, गर्भावर आणि मातेवर होणारा परिणाम\nHome » Research » बुद्धिनिष्ठ प्रार्थनेचा, गर्भावर आणि मातेवर होणारा परिणाम: एक संख्यात्मक दृष्टिकोन\nबुद्धिनिष्ठ प्रार्थनेचा, गर्भावर आणि मातेवर होणारा परिणाम: एक संख्यात्मक दृष्टिकोन\n* श्री. गजानन केळकर, एम्.टेक.\n* डॉ. अमिता धर्माधिकारी, पीएच्.डी.\n* डॉ. अविनाश धर्माधिकारी, पीएच्.डी.\nया अभ्यासाचा उद्देश असा होता की, ‘चांगले विचार’ - ज्याला ‘प्रार्थना’ म्हणतात - त्याचा परिणाम, तिसऱ्र्या तिमाहीतील गर्भावर, गर्भधारी मातेवर आणि पित्यावर काय होतो, याची पडताळणी करणे.\nया प्रयोगात थोर विचारवंत, तत्वज्ञ व ज्यांनी नि:स्वार्थ वृत्तीने आपले संपूर्ण आयुष्य समाज कल्याणासाठी वाहून घेतले त्या आदरणीय स्वामी विज्ञानानंद यांच्या आवाजातील ‘प्रार्थना’, संबंधितांना ऐकविण्यात आली. ज्या कुटुंबांवर हा प्रार्थना-प्रयोग केला गेला, त्यांचा स्वामीजींशी पूर्वपरिचय नव्हता.\nसदर अभ्यासात, एकूण १,८५० केसेस्चे सूक्ष्म विश्लेजषण करण्यात आले. या अभ्यासाचे गृहीतक असे होते की, ‘‘गर्भ, माता आणि पित्यासाठी केलेली प्रार्थना परिणामकारक ठरु शकते, कारण, ती क्वॉंटम् मेकॅनिक्समधील ‘दुरुन परिणाम करता येतो’ (spooky action at a distance) या प्रक्रियेशी मिळती जुळती आहे.’’\nसर्व १,८५० केसेसमध्ये, गर्भाची हृदयगती, मातेची व पित्याची नाडीगती, ही प्रार्थनापूर्व आणि प्रार्थनेनंतर मोजण्यात आली. (हृदयगती आणि नाडीगती ही व्यक्तीची भावनिक स्थिती व गरज यांचे संवेदनशील निर्देशक असते.) प्रार्थनेमुळे गर्भाच्या हृदयगतीवर व मातेच्या व पित्याच्या नाडीगतीवर निश्चितपणे चांगला परिणाम होतो, असा या अभ्यासाचा निष्कर्ष आहे.\nतसेच, गर्भ, माता व पिता या तिघांच्याही बाबतीत, स्थिरतेचा एक आकृतीबंध आढळून आला; तो असा - ‘प्रार्थनेपूर्वी ज्यांची नाडीगती नॉर्मलपेक्षा खूप कमी होती, ती प्रार्थनेनंतर, (नॉर्मल रेंजकडे) वाढण्याकडे कल राहिला. प्रार्थनेपूर्वी ज्यांची नाडीगती नॉर्मलपेक्षा खूप जास्त होती, ती प्रार्थनेनंतर, (नॉर्मल रेंजकडे) कमी होण्याकडे कल राहिला. व प्रार्थनेपूर्वी ज्यांची नाडीगती नॉर्मल रेंजमध्ये होती, ती प्रार्थनेनंतर, नॉर्मल रेंजमध्येच राहिली.’\n(महत्वाचे: संपूर्ण शोधनिबंध वाचण्यासाठी खालील अटॅचमेंट डाउनलोड करा.)\nनवविवाहित जोडपी आणि गर्भधारणेपूर्वी\nगर्भसंस्कार (जन्मपूर्व शिक्षण-संस्कार प्रयोग)\nआध्यात्मिक विकास (योग, ध्यान, मंत्र, यज्ञ, पुजा, प्रार्थना, धर्म, देव)\n`स्वानंद' आयुर्वेदीय औषध उत्पादने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/01/22/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%AA-%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95/", "date_download": "2018-08-18T10:52:14Z", "digest": "sha1:UCLCQGEYATJRX344OLDKYK6RINDJWGWW", "length": 21932, "nlines": 267, "source_domain": "kayvatelte.com", "title": "आयडीया सारेगमप ‘किती सत्य आणि किती असत्य?’ उंदरावलोकन’ | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← अमेरिका,ओबामा आणि जनरल मोटर्स ची लिमो.\nस्लमडॉग मिलियॉनिअर The Bait For Oscar\nआयडीया सारेगमप ‘किती सत्य आणि किती असत्य\nआजपर्यंतचा प्रवास पाहायचा तर, प्रथा आहे सिंहावलोकन म्हणण्याची ,ज्या काळाचा आढावा घेतोय तो फार लहान म्हणून उंदरावलोकन. सध्या एक पुस्तक वाचतोय त्यातला,त्यातला हा शब्द आवडला म्हणून वापरलाय.\nआर्या चा आत्तापर्यंतचा गाणी म्हटली ती सगळी गाणी लतादिदी, आशाताई, सुमन कल्याणपुरकर, किशोरी आमोणकर इत्यादी महागायकांची, आणि प्रथितयश आणि गायकाची परीक्षा घेणारे संगीत देणारे हृदयनाथ मंगेशकर, सुधीर फडके, पु.ल., राम कदम सारख्या दिग्गज संगीतकारांची होती.ह्या प्रवासात तिने अनेक गाण्यांसाठी नी मिळविला होता..ईतक असूनही तिला क्रीटीक्स ची वाहवा फारशी मिळालेली नाही.\nसगळ्यांची गाणी ऐकुन झाली. मुग्धा अर्थात छान म्हणते, परंतु वयामुळे येणारे लिमिटेशन्स टाळता येत नाही. ती कठीण ताना सोप्या करून घेते म्हणून तिला अवधूत ती ज्या प्रकारे गाणं म्हणते त्या प्रकाराला मुग्धा गीत असे म्हणतो. ” तिच्या मधले टॅलंट , ती मोठी झाली की मग पुढे नक्कीच प्रत्ययास येइल. वयाप्रमाणे जाण वाढली की गाण्याचा स्तरही वाढेल पण,आत्ताच ’संपुर्ण’ गाणं तिच्या कडून अपेक्षा करू नये. तिला तिच्या वया प्रमाणेच गाणी म्हणू द्यावीत. हळू हळू तिच्यातला इनोसन्स कमी होतांना जाणवतोय. ती फार वैतागलेली दिसते आजकाल. उजव्या तर्जनीने माइक वर धरलेला ठेका, आता कमी झालाय .डोळ्यामधे आणि आवाजात थकवा जाणवतो.\nप्रथमेश आणि कार्तीकी चा पण प्रश्नच नाही.पण(मी नेहेमी सगळ्यांची गाणी आय पॉड वर ऐकतॊ.मला हे जाणवलं की प्रथमेश चे उच्चार थोडे स्पष्ट नाहीत. ’स’ चा उच्चार तॊ व्यवस्थीत करित नाही.) स्पेशली आर्या आंबेकर चा परफॉर्मन्स मला जास्त आवडतो. तिच्या आवाजात एक वेगळंच माधुर्य आहे. गाणं ऐकायला गोड वाटतं तिच्याकडून.\n आणि रोहित राऊत का बचावला हा प्रश्न मला नेहेमीच सतावतो. त्याची सगळी गाणी मी डाउन लोड करून ऐकली. स्वरांच्या बाबतीत तो जरा कच्चा वाटतॊ. आवाज बरेचदा खराब होतो, ताल चुकतो, एवढं सगळं असतांना, त्याने मॅनेज केलय इथपर्यंत . कौतुकास्पद आहे. आधीच्या काही एपिसोड्स मधे केवळ त्याने गाण्यामधे व्हेरिएशन दिले म्हणुन त्याला बेस्ट पर्फॉर्मन्स ऑफ़ द एपिसोड चा मान मिळाला. माझ्या मते शाल्मली वर अन्याय झालाय. तिच्या बद्दल जरा वाईटच वाटतं ..आणि रोहित राऊतचं गाणं ऐकलं की ते प्रकर्षाने जाणवतं..\nशाल्मली ने जे गाणं म्हंटलं होतं… कशाला उद्याची बात… अरे कसलं झकास गायलं होतं तिने.. अगदी तोडलं होतं… आणि ह्याच हेच गाणं ऐकल्यावर/ पाहिल्यावर देवकी पंडीत म्हणाल्या होत्या की परफॉर्मन्स देउ नकोस…. असं का म्हणाल्या त्यांनाच ठाउक. मला तरी वाटतं की नुसतं गळ्याने गायलेल्या गाण्यापेक्षा जेंव्हा संपुर्ण शरीर गाणं म्हणतं ते जास्त चांगलं होतं. परफॉर्मन्स असला तर गाणं प्रेक्षणीय होतं.\nअर्थात नेहेमी चेहेऱ्यावर १२ वाजल्याचे भाव घेउन फिरणाऱ्या देवकी पंडितांना हे कळणार नाही. फार वर्षांपुर्वी एक कार्यक्रम झाला होता, जेंव्हा त्यांचं वय बहुतेक १४-१५ असावं, तेंव्हा त्यांनी एकदा ह्रुदयनाथ मंगेशकरांच्या गाण्याच्या कार्यक्रमात एक दोन गाणी म्हटली होती. हा कार्यक्रम आहे माझ्याकडे रेकॉर्ड केलेला.. तेंव्हा सुद्धा त्यांच्या चेहेऱ्यावर असेच निर्विकार भाव होते.\nजर देवकी बाईंचं खरं समजायचं, तर आशा भोसलेंना पण हया असंच म्हणणार कां आशा ताईंचं गाणं पण श्रवणीय असतंच आणि प्रेक्षणीय पण असतं..\nपदरावरती जरतारीचा…. आठवतय कां आशाताइंनी परफॉर्म केलेलं\nज्या दिवसापासून देवकी पंडितांनी निरागस पणे गाणं म्हणणाऱ्या शाल्मलीला ’झापलं’ होतं, तेंव्हा पासुनच हा विषय मनात घोळत होता. हे ब्लॉगींग आत्ता सुरु केलं , म्हणून विचार केला, की कव्हर करावा..\nमाझ्या मते शाल्मली आणि आर्या अगदी तुल्यबळ आहेत..शमिका भिडे चा उल्लेख केल्याशिवाय हे पोस्ट पुर्ण करणे संयुक्तीक वाटंत नाही. तिचा पण फारच छान सहभाग होता. आवाज, आणि तालाचे उत्तम मिश्रण होते तिच्या गाण्यात.. शमीका भिडेने “मी गाताना” काय मस्त गायले. होतं अगदी अक्षरशः डॊळ्यात पाणी आणलं त्या मुलीने.. मला असे वाटते की ती ला निदान एक तरी “नी” मिळायला हवा होता..\nह्या मुलांना इतकं ग्लॅमर मिळालय की आता हे सांभाळणं त्यांच्या पालकांना आणि त्यांना पण अवघडच जाणार.मुग्धाला रायगड भूषण , तसेच कार्तिकी आणि रोहित ला मराठवाडा भूषण, प्रथमेशला कोंकण गंधर्व, हा प्रस्कार मिळाला ही आनंदाची बातमी नक्कीच आहे.पण इतक्या लहान वयात मिळालेलं ह्या मोठपणाने त्या मुलांचं आयुष्यात एकदाच मिळणारं बालपण कुठेतरी हरवून जाणार नाही ना ह्याची काळजीही वाटते\nलहान पणी ग्लॅमरस आयुष्य़ जगलेले काही जण आठवतात. मास्टर अलंकार.. म्हणजे पल्लवीचा भाऊ, तसेच,जुनिअर मेहमुद, आणि जुगल हंसराज .. मासुम वाला.मोठेपणी हे सगळे फेल झालेत ह्या कॉम्पीटीशन च्या जगात…मोठेपणी हे लहानपणचं वलयं जर शिल्लक राहिलं नाही तर आयुष्याची पार वाताहात होऊ शकते.\nपल्लवी पण बालकलाकार होती. तिचं नशिब चांगलं म्हणुन तिला सारेगम मधे चान्स मिळाला, नाहितर ती पण विस्मृतीच्या पडद्याआडच गेली होती..खरं की नाहीं\nअजुन एक प्रश्न सतावतोय…… एस एम एस कमी मिळाले म्हणुन बाहेर काढले असे म्हणतात. पण किती एसएमएस आले ते कोणीच सांगत नाही.\nकशावरुन झी आपल्या स्वतःच्या व्हिम्ज आणि फॅन्सिज मुळे नको असलेले कॅंडीडेटस बाहेर काढलेलेव्हल ऑफ ट्रान्सपरंसी फारच कमी आहे.\nकधी तरी संशय पण येतो, विजेता आधीच ठरलाय कां\n← अमेरिका,ओबामा आणि जनरल मोटर्स ची लिमो.\nस्लमडॉग मिलियॉनिअर The Bait For Oscar\n6 Responses to आयडीया सारेगमप ‘किती सत्य आणि किती असत्य\nगाणी डाउन्लोड करण्याची लिंक दिलेली आहे ह्या पेजवरच..\nतरिही पुन्हा लिंक देतो आहे..\nशाल्मली खरच हवी होती टॉप ५ मध्ये .योग्यच लिहिल आहे तुम्ही तिच्याबद्दल .\nमला तर सगळ्याच realty shows च्या निकालाबबत शंका येते\nबाकी आर्याच्या गाण्याबाबत तर काही शंकाच नाही .\nमाझा शेवटचा लेख पहा, त्यात मी स्वतः खुल्या मनाने ते कबुल केले आहे . प्रत्येकाचेच कोणि तरी फेवरेट्स होते, तसेच माझे फेवरेट्स प्रथमेश आणि आर्या होते.\nरोहित बद्दल मला पर्सनल ग्रज नाही, पण मला त्याला सुरांची जाण नाही असे वाटते,\nप्रथमेश चा :स: म्हणण्याचा प्रॉब्लेम पण मी लिहिलाय कूठे तरी..\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nसिक्रेट मेसेज कसा पाठवायचा\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-cheating-customers-discarding-microchip-55573", "date_download": "2018-08-18T10:52:36Z", "digest": "sha1:3PIQYV7AR5LECKJTFFIUEROWC2LP7CBZ", "length": 18178, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news Cheating customers by discarding microchip मायक्रोचिप टाकून ग्राहकांशी चिटिंग | eSakal", "raw_content": "\nमायक्रोचिप टाकून ग्राहकांशी चिटिंग\nमंगळवार, 27 जून 2017\nमानकापुरातील पेट्रोलपंपावर पोलिसांचा छापा - ठाणे क्राइम ब्रॅंचची कारवाई\nनागपूर - मानकापुरातील एका पेट्रोलपंपावर ठाणे गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने छापा घातला. पेट्रोलपंपावरील दोन मशीनमध्ये सेटिंग करून ग्राहकांची फसवणूक केल्या जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पेट्रोलपंपावर सील करण्याची कारवाई करण्यात आली. या छाप्यामुळे शहरातील अनेक पेट्रोलपंपचालकांचे धाबे दणाणले.\nमानकापुरातील पेट्रोलपंपावर पोलिसांचा छापा - ठाणे क्राइम ब्रॅंचची कारवाई\nनागपूर - मानकापुरातील एका पेट्रोलपंपावर ठाणे गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने छापा घातला. पेट्रोलपंपावरील दोन मशीनमध्ये सेटिंग करून ग्राहकांची फसवणूक केल्या जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पेट्रोलपंपावर सील करण्याची कारवाई करण्यात आली. या छाप्यामुळे शहरातील अनेक पेट्रोलपंपचालकांचे धाबे दणाणले.\nमानकापुरात झिंगाबाई टाकळी परिसराच्या प्रवेशद्वारासमोरच भाजपचे नेते नवनीतसिंग तुली यांच्या मालकीचे रबज्योत पेट्रोलपंप आहे. येथे चार पेट्रोल वेंडिंग मशीन आहे. ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने सोमवारी दुपारी छापा घातला. चारही मशीनची तपासणी करण्यात आली. या वेळी दोन मशीनमधून पाच लिटर पेट्रोल झिरो सेट केल्यानंतर काढण्यात आले. एका मशीनमधून पाच लिटर पेट्रोल काढल्यानंतर ते केवळ ४ लिटर ८०० मिली तर दुसऱ्यामधून ४ लिटर ७८० मिली पेट्रोल बाहेर पडले. त्यामुळे दोन्ही पेट्रोल वेंडिंग मशीनमधून १० लिटर पेट्रोलवर ४२० मिली पेट्रोल कमी भरले. ही बाब लक्षात घेता पेट्रोल वेंडिंग मशीनची तपासणी केली असता मशीनमधून एक विशिष्ट इलेक्‍ट्रॉनिक मायक्रोचिप बसवलेली आढळल्याची माहिती आहे. त्यामुळे दोन्ही मशीनला सील ठोकण्यात आले आहे.\nठाणे गुन्हे शाखेच्या तावडीत एक आरोपी सापडला. त्याने विशिष्ट इलेक्‍ट्रॉनिक मायक्रोचिप तयार केली असून ती पेट्रोल पंपमालकांना विकल्याची कबुली दिली. त्यानुसार ठाण्यातील एका पेट्रोलपंपावर गुन्हे शाखेने छापे घातले. यामध्ये इलेक्‍ट्रॉनिक चिपमधून प्रतिलिटरवर पाच रुपयांचे पेट्रोल कमी दिल्या जात असल्याचे आढळून आले होते. त्या आरोपीने नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पेट्रोलपंप मालकांना ही मायक्रोचिप विकल्याची माहिती दिली. त्यावरून ठाणे गुन्हे शाखेने नागपुरातील नवनीत तुली याच्या पेट्रोलपंपावर छापा घालून दोन मशीनवर कारवाई केली.\nपेट्रोल विक्रेत्यांनी घेतली धास्ती\nमानकापुरातील नवनीत तुलीच्या पेट्रोलपंपावर छापा पडल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरभर पसरली. त्यामुळे ‘मापात-पाप’ करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या पेट्रोलपंप मालकांनी चांगलीच धास्ती घेतली होती. ज्या संचालकांनी पंपावर मायक्रोचिप बसवलेली आहे. त्यांनी लगेच ‘पंप दुरुस्ती’चे बोर्ड लावले होते. तर, काहींनी ‘पेट्रोल नाही’ असे फलक लावले होते. त्यावरून अनेकांनी धास्ती घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nशहरातील अनेक पेट्रोलपंपांवर ग्राहकांची फसवणूक केली जाते. अनेक वेळा पंपावरील कर्मचारी हाताला झटका देऊन तर कधी बोलण्यात गुंतवून ठेवल्यानंतर पेट्रोल कमी भरतात. अनेकवेळा पंपावरील कर्मचाऱ्यांशी ग्राहकांचा वाद होतो. मात्र, तेथील सर्वच कर्मचारी तक्रारकर्त्या ग्राहकावर तुटून पडतात. त्यामुळे वाहनचालक एकटा पडल्याने माघार घेतो. कधी पंपमालकांचाही हिस्सा असल्यामुळे तक्रार आल्यानंतरही कोणतीही कारवाई पंप कर्मचाऱ्यांवर केली जात नसल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.\nवैध मापनशास्त्र विभाग अनभिज्ञ\nपेट्रोल पंपावरील योग्यता व प्रमाण तपासण्यासाठी वैधमापन विभाग कार्यरत आहे. मात्र, या विभागाने आतापर्यंत कोणतीही विशेष कारवाई केली नाही. त्यामुळे या विभागातील अधिकाऱ्यांची पेट्रोल पंप चालकांशी ‘सेटिंग’ असल्याचा आरोप नेहमी होतो. त्यामुळे ठाणे गुन्हे शाखेने वैधमापन विभागाला कोणत्याही प्रकारची माहिती न देता अचानक छापामार कारवाई केली. त्यामुळे तुली पेट्रोल पंपावरील पाप उघडकीस आले.\nठाणे गुन्हे शाखेच्या हाती लागलेल्या आरोपीने महाराष्ट्रासह अन्य राज्यातील पेट्रोल पंपमालकांच्या भेटी घेऊन मायक्रो चिप विकली. त्यासाठी त्याने लाखांत घसघशीत रक्‍कम घेतली. मात्र, पेट्रोलपंप संचालकांनी आतापर्यंत सामान्य नागरिकांची पिळवणूक करीत कोट्यवधी रुपयांची कमाई केली. त्याचा सरळ भुर्दंड सामान्य नागरिकांच्या खिशावर पडला.\nपिंपरी - दोन मुलांना मारून वडिलांची आत्महत्या\nपिंपरी (पुणे) - दोन मुलांना मारून वडिलांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना शनिवारी दुपारी ताथवडे येथे घडली. शुभम बर्मन (वय १०) रूपम वर्मा (वय...\nMaratha Kranti Morcha : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री आंदोलन\nपुणे : मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे सोमवारपासून (ता.20) मराठा आरक्षणासाठी आणि विविध मागण्यांसाठी पुणे विभागीय आयुक्त...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nभाषणात मोठी ताकद आहे.. : बबन साळगांवकर\nसावंतवाडी : भाषणात मोठी ताकद आहे त्याच वक्तृत्वाचा फायदा घेऊन तब्बल 23 दिवसांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे पहिल्यांदा आमदार बनले आणि त्यांनी नंतर...\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-s02-sliver-price-p1ACBy.html", "date_download": "2018-08-18T10:18:12Z", "digest": "sha1:7PF5JAUTSIQIYALZQKES5POQ4IY5HG7B", "length": 17779, "nlines": 453, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स स्०२ स्लिव्हर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स स्०२ डिजिटल कॅमेरा\nनिकॉन कूलपिक्स स्०२ स्लिव्हर\nनिकॉन कूलपिक्स स्०२ स्लिव्हर\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स स्०२ स्लिव्हर\nनिकॉन कूलपिक्स स्०२ स्लिव्हर किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स स्०२ स्लिव्हर किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्०२ स्लिव्हर नवीनतम किंमत Jul 12, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स स्०२ स्लिव्हरहोमेशोप१८, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्०२ स्लिव्हर सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 4,950)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स स्०२ स्लिव्हर दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स स्०२ स्लिव्हर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स स्०२ स्लिव्हर - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 3 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स स्०२ स्लिव्हर - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन कूलपिक्स स्०२ स्लिव्हर वैशिष्ट्य\nलेन्स तुपे Nikkor Lens\nअपेरतुरे रंगे f/3.0 - f/5.9\nसेल्फ टाइमर 10 sec\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 13.2 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nसेन्सर सिझे 1/3 Inches\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 1 sec\nस्क्रीन सिझे 2.7 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230000 Dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 16:9\nऑडिओ फॉरमॅट्स LPCM Stereo\nइनबिल्ट मेमरी 7.3 GB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nनिकॉन कूलपिक्स स्०२ स्लिव्हर\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://shatadapremkarave.blogspot.com/2008/03/blog-post_08.html", "date_download": "2018-08-18T10:49:19Z", "digest": "sha1:F2T73AD4TALHL2V46HR726KCHQ56OFL2", "length": 2620, "nlines": 59, "source_domain": "shatadapremkarave.blogspot.com", "title": "शतदा प्रेम करावे: आठवण", "raw_content": "\nनमस्कार मित्रानो. मी अनिल बिहाणी . मझ्याबाबातीत सांगण्यासारखे विशेष काहिच नाहि.मी एक् सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य मुलगा आहे.पण प्रत्येक समान्यात कुठे तरि असामन्यत्व द्डलेलं असतं.माझ्यातल्या या असामान्यत्वाचा शोध् घेणे सद्या सुरु आहे.\nयेइल का गं तुला माझी आठवण \nहोइल का गं पापणी ओली\nभासेल का एखादी संध्याकाळ\nअन् पाहून त्या वेड्या चन्द्रास\nआठवेल का रात्र जागवलेली\nविचारलं मी काहीसं हळवं होत\nतुझा हात अफ़्गदी घटट्\nतू टाकलास एक शांत कटाक्ष\nआणि वार्यावरती गंध पसरावा\n\"वेड्या, आठवण येण्यासाठी विसरावं लागतं.\"\nजय हो तेरी गोविंदा ......\nही वाट दूर जाते .......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/prashant-bhushan-objected-name-anti-romeo-squad-38123", "date_download": "2018-08-18T11:07:39Z", "digest": "sha1:BEIFEMMZUNO6LZFETE4367G3VMHSV2D5", "length": 13942, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "prashant bhushan objected name of anti romeo squad 'रोमिओविरोधी पथकाला कृष्णविरोधी म्हणण्याची हिंमत आहे का?' | eSakal", "raw_content": "\n'रोमिओविरोधी पथकाला कृष्णविरोधी म्हणण्याची हिंमत आहे का\nरविवार, 2 एप्रिल 2017\nउत्तर प्रदेशमधील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सत्तेत आल्यानंतर मुलींची छेड काढणाऱ्या रोमिओविरोधी पथकांची स्थापन केली आहे. मात्र,काही जणांनी \"रोमिओविरोधी' या नावावर नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्‍वभूमीवर ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी \"रोमिओविरोधी पथकाला कृष्णविरोधी पथक म्हणण्याची हिंमत आहे का', असा प्रश्‍न विचारत टीका केली आहे.\nनवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सत्तेत आल्यानंतर मुलींची छेड काढणाऱ्या रोमिओविरोधी पथकांची स्थापन केली आहे. मात्र,काही जणांनी \"रोमिओविरोधी' या नावावर नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्‍वभूमीवर ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी \"आदित्यनाथ यांच्यात रोमिओविरोधी पथकाला कृष्णविरोधी पथक म्हणण्याची हिंमत आहे का', असा प्रश्‍न विचारत टीका केली आहे.\n\"रोमिओ केवळ एकाच मुलीवर प्रेम करतो. तर कृष्ण अनेक मुलींची छेड काढण्यात लोकप्रिय होता. या पथकाला (रोमिओविरोधी पथक) कृष्णविरोधी पथक म्हणण्याची हिंमत आदित्यनाथ यांच्याकडे आहे का', असा प्रश्‍न प्रशांत भूषण यांनी ट्विटरद्वारे उपस्थित केला आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने भूषण यांना तातडीने उत्तर दिले आहे. \"कृष्णाला समजून घेण्यासाठी कित्येक जन्म घ्यावे लागतील. किती सहजपणे कृष्णाला राजकारणातून ओढले आहे. दु:खद बाब आहे', असे प्रत्युत्तर देत भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी दिले आहे.\nकृष्ण को समझ ने में कई जन्म लेने पड़ेंगे\nकितने आसानी से कृष्ण को राजनीति में घसीट लाए\nदुःख की बात है\nटीका होत असल्याचे पाहत प्रशांत भूषण यांनी आपल्या आणखी पुन्हा ट्‌विटरद्वारे खुलासा केला आहे. \"रोमिओ (विरोधी) पथकाबाबतच्या माझ्या ट्‌विटचा विपर्यास करण्यात आला. मला असे म्हणायचे होते की, रोमिओ (विरोधी) पथक ज्या आधारावर म्हटले जाते त्या तर्कानुसार भगवान कृष्णही छेडछाड करणारेच ठरतात.'\nरोमिओ हा लोकप्रिय नाटककार शेक्‍सपिअर यांच्या नाटकातील पात्र आहे. रोमिओ-ज्युलिएटची प्रेमकथा प्रेम आणि समर्पणासाठी जगभर लोकप्रिय असल्याचे म्हणत ट्विटरवर काही जणांनी उत्तर प्रदेशमध्ये मुलींची छेडछाड काढणाऱ्या पथकांना \"रोमिओविरोधी पथक' संबोधण्यावर नाराजी व्यक्त केली आहे.\nढाब्यावर फरशी पुसणारी युवती खेळणार आशियाई स्पर्धेत\nमनाली : जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर खेळाडू कसे आपले स्वप्न करू शकतो, याचे जिवंत उदाहरण हिमाचल प्रदेशात पाहायला मिळाले आहे. धाब्यावर फरशी पुसण्याचे...\nएमआयएम नगरसेवक मतीन यांना अटक\nऔरंगाबाद- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला नकार देणारे औरंगाबादमधील एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना आज अटक करण्यात...\nऔरंगाबाद : 'एमआयएम'च्या नगरसेवकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा\nऔरंगाबाद : महापालिकेत एमआयएम नगरसेकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या पाच नगरसेवकांविरोधात शुक्रवारी (ता.17) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयएम नगरसेवक...\nनोटा बदलवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश\nरावेर : जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा बदलून देणाऱ्या गुजरातमधील टोळीस इंदूरमध्ये मध्य प्रदेश पोलिसांनी आज पकडले. या टोळीत रावेर, भुसावळच्या...\nपंतप्रधान मोदी केरळमध्ये दाखल ; पुरपरिस्थितीचा आढावा घेणार\nतिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरात आत्तापर्यंत 300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर कोट्यवधींचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/600344", "date_download": "2018-08-18T10:24:56Z", "digest": "sha1:DRCEM7HXZKR3CTR52H4WKYNLJ7FGBRZF", "length": 15548, "nlines": 59, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "हुतात्मा जवानांना अखेरचा सलाम - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हुतात्मा जवानांना अखेरचा सलाम\nहुतात्मा जवानांना अखेरचा सलाम\nआप्पाजी पाटील / नंदगड\nशहीद जवान संतोष गुरव अमर रहे, जय जवान जय किसान, बोलो भारत माता की जय, या घोषणांनी संपूर्ण हलगा गाव दणाणून सोडण्यात आला. आपल्या गावच्या लाडक्या जवानाला अखेरचा सलाम देण्यासाठी अबालवृद्धांपासून सर्वजण एकवटले होते. शासकीय अधिकाऱयांसह खानापूर तालुक्यातील हजारो लोक सहभागी झाले होते. भावपूर्ण वातावरणात हुतात्मा जवान संतोष गुरव यांच्यावर बुधवारी दुपारी 1.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.\nछत्तीसगड राज्यातील बस्तर विभागात नक्षलवाद्यांनी सोमवारी केलेल्या भू-सुरुंग स्फोटात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान हुतात्मा झाले होते. यात खानापूर तालुक्यातील हलगा गावचा संतोष लक्ष्मण गुरव (वय 27) तर कारवारचा विजयानंद सुरेश नाईक (वय 28) यांचा समावेश होता. सोमवार दि. 9 रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास वरील दोघेही दुचाकीवरून गस्त घालण्यासाठी जात होते. बस्तर विभागातील ताडबाऊली गावाजवळ झालेल्या भू-सुरुंग स्फोटात त्यांना वीरमरण प्राप्त झाले होते.\nछत्तीसगड येथील रायपूरहून मुंबई येथे व मुंबई येथून गोव्याला विमानाने दोघांचेही पार्थिव आणण्यात आले. त्यानंतर संतोष गुरव यांचे पार्थिव गोव्याहून अनमोडमार्गे खानापूरला आणण्यात आले. नंदगड हलशीमार्गे हलग्याला नेण्यात आले.\nनंदगड येथे दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या पदवीपूर्व महाविद्यालयातर्फे संतोषच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहण्यात आले. त्यानंतर हलशी ग्रामस्थांतर्फे पुष्पमाळ घालून अभिवादन करण्यात आले. हलशी येथील शाळा विद्यार्थ्यांसह नागरिक सहभागी झाले होते. हलगा येथे सजविलेल्या ट्रक्टरमध्ये पार्थिव ठेवून गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. संतोष पूर्वी ज्या शाळेत शिकला त्या हलगा प्राथमिक शाळेचे वनश्री हायस्कूलचे विद्यार्थी व शिक्षक तसेच ग्रामस्थ, नातेवाईक मिरवणुकीत सहभागी झाले होते. पार्थिव घराकडे नेण्यात येऊन कुटुंबीयांनी अंतिम दर्शन घेतले. हलगा मराठी शाळेच्या आवारात पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. उपस्थित सर्वांनी रांगेने येऊन अंतिम दर्शन घेतले.\nयावेळी माजी आमदार अरविंद पाटील, तोपिनकट्टी महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, माजी ग्रा. पं. सदस्य रणजित पाटील, अर्जुन देसाई, म. ए. समितीचे माजी अध्यक्ष विलास बेळगावकर, विठ्ठल पाटील, मार्केटींग सोसायटीचे गोपाळ पाटील, डी. एम. गुरव. ग्रा. पं. अध्यक्षा वैशाली सुतार, विठ्ठल गुरव, महाबळेश्वर पाटील, नागेशी पठाण यांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. यावेळी खानापूर तालुका म. ए. समिती, भाजप, श्रीराम सेना, साईकृष्ण सेवा प्रतिष्ठान, विश्व हिंदू परिषद, कुस्ती संघटना, हलगा ग्रा. पं., हलगा कलमेश्वर मल्टीपर्पज सोसायटी तसेच सिद्धकला मित्रमंडळ पुणे आदींच्यावतीने व प्रशासनाच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.\nत्यानंतर सजविलेल्या ट्रक्टरमधून पार्थिव अंत्यसंस्काराच्या ठिकाणी नेण्यात आले. संतोषचे वडील लक्ष्मण गुरव यांनी भडाग्नी दिला. यावेळी बेळगावचे जिल्हाधिकारी झियाउल्ला एस., जि. पं. चे कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन, प्रांताधिकारी कविता योगपन्नावर, तहसीलदार शिवानंद उळागड्डी, ता. पं. कार्यकारी अधिकारी पी. बी. कट्टी, माजी आमदार अरविंद पाटील, माजी आमदार दिगंबर पाटील, श्रीराम सेनेचे अध्यक्ष पंडित ओगले आदींसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित होती.\nकुटुंबीयांनी फोडला एकच हंबरडा\nसंतोषचा मृतदेह घराजवळ येताच त्यांची पत्नी राजश्री, वडील लक्ष्मण, आई प्रेमीली व बहिणींनी एकच हंबरडा फोडला. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांचेच डोळे पाणावले.\nहलगा येथे संतोषचे स्मारक व्हावे\nसंतोष गुरव देशरक्षणासाठी हुतात्मा झाला. त्याची आठवण म्हणून हलगा गावात संतोषच्या नावे स्मारक व्हावे, अशी इच्छा तोपिनकट्टी महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर यांनी व्यक्त केली. तसेच त्यासाठी आपल्या संस्थेतर्फे 51 हजार रुपये देण्याचे जाहीर केले.\nवाघासारखा माझा मुलगा देशसेवेसाठी झटला\nजीवनात प्रसंगी मोलमजुरी करून स्वत:च्या तीन मुलींसह मुलाला लहानाचे मोठे करून शिक्षण दिले. घरी आल्यावर नेहमीच तो आम्हाला वाघासारखा मदत करी. आता आनंदाचे दिवस येतील, असे वाटत असतानाच माझा मुलगा संतोष नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात ठार झाला. एकीकडे एकुलता मुलगा गेल्याचे दु:ख आहेच. परंतु देशसेवेसाठी माझा मुलगा हुतात्मा झाला, याचा अभिमानही असल्याचे वक्तव्य संतोषचे वडील लक्ष्मण गुरव यांनी व्यक्त केले.\nज्या नक्षलवाद्यांनी बॉम्ब स्फोट घडवून माझ्या नवऱयाचा प्राण घेतला. त्याचा बदला घ्या, अशी संतप्त भावना संतोषची पत्नी राजश्री हिने यावेळी व्यक्त केली.\nसंतोष गुरव देशाच्या संरक्षणासाठी लढला. अनेक हालअपेष्ठा सोसूनही त्याने देशासाठी दिलेले बलिदान कधीही विसरून चालणार नाही, असे मत माजी आमदार अरविंद पाटील यांनी मांडले.\nपुणे मित्रमंडळातर्फे 51 हजार\nसंतोष गुरव यांचे पुणे येथे अनेक मित्र आहेत. संतोषच्या निधनाची बातमी समजताच त्यांचे अनेक मित्र पुण्याहून हलग्याला दाखल झाले. त्यांनी संतोषच्या कुटुंबीयांना मदत म्हणून 51 हजार रुपये देण्याची घोषणा केली.\nआमदार निंबाळकर यांचा शोक संदेश\nखानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी संतोष गुरवच्या निधनाबद्दल शोक संदेश पाठविला आहे. शासनाच्यावतीने संतोषच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.\nभावाला बांधली अखेरची राखी\nसंतोष गुरव हा एकुलता मुलगा तर त्याला तीन बहिणी आहेत. आपल्या भावाचे अंतिम दर्शन घेताना बहिणींनी एकच हंबरडा फोडला. त्यांनी भावाच्या अंतिम दर्शनावेळी राख्या आणल्या होत्या. यावेळी त्यांनी आपल्या भावाला अखेरची राखी बांधली. हा प्रसंग पाहून सर्वांचेच हृदय हेलावून गेले.\nमनपा आकारणार वाढीव दराने भूभाडे शुल्क\nकेपीएमई विधेयक विधानसभेत संमत\nवेगवेगळय़ा विषयाच्या-आशयाच्या कवितांची लाभली पर्वणी\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/600642", "date_download": "2018-08-18T10:26:46Z", "digest": "sha1:ZCW6AQMW5KOWPMUGIYPMWZJOM4C6IN4U", "length": 5364, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "दादा वासवानी यांना शोकाकुल वातावरणात निरोप - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » दादा वासवानी यांना शोकाकुल वातावरणात निरोप\nदादा वासवानी यांना शोकाकुल वातावरणात निरोप\nऑनलाईन टीम / पुणे :\nशाकाहारासाठी देशविदेशात प्रचार करणारे साधू वासवानी मिशनचे प्रमुख दादा वासवानी यांना त्यांच्या देश विदेशातील अनुयायांनी शेवटचा निरोप दिला. वासावनी यांचे गुरूवारी सकाळी 9.01 वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करणे सुरू आहे.\nतत्पूर्वी साधू वासवानी मिशनपासून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. या अंत्ययात्रेत त्यांचे देश, विदेशातील अनुयायी सहभागी झाले होते. दिवसभर वासवानी मिशनमध्ये त्यांचे अंत्यदर्शन खुले ठेवण्यात आले होते.त्यावेळी भजन आणि नामस्मरण करणे सुरु होते. त्यांचे दर्शन घेण्यासाठी सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मोठी गर्दी केली होती. शुक्रवारी सकाळी भारतीय जनता पार्टीचे नेते लालकृष्ण आडवाणी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. संपूर्ण वातावरण भावुक झाले होते. अंत्यसंस्कारांपूर्वी विविध धर्माच्या धर्मगुरूंनी त्यांना आदरांजली वाहिली.\nमराठा समाजाचा 10 मेला आता अर्धनग्न मोर्चा\nतीन वर्षांच्या कामगिरीचा अहवाल सादर करा ; पंतप्रधानांचे सर्व मंत्र्यांना आदेश\nभाजपामध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा ; संजय राऊत यांचा दावा\nजमीन खरेदीसाठी कोकणात गेलेल्या महिलेची हत्या\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.tarunbharat.com/news/445486", "date_download": "2018-08-18T10:25:32Z", "digest": "sha1:W3CBXFCQ5PXSBE7OHABUZEIMXWFG33VB", "length": 9374, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पेडणे, सावर्डेचा तिढा सुटला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » पेडणे, सावर्डेचा तिढा सुटला\nपेडणे, सावर्डेचा तिढा सुटला\nभाजपच्या उमेदवार निश्चितीबाबत दीर्घकाळ चर्चेत राहिलेल्या पेडणे, सावर्डे या प्रमुख मतदारसंघासह कुंभारजुवे, पर्वरी या मतदारसंघातील उमेदवारीवर अखेर भाजपच्या उमेदवार निवड समितीने शिक्कामोर्तब केले आहे, मात्र काणकोण मतदारसंघावरील टांगती तलवार कायम असून काणकोणचा गुंता अद्याप सुटलेला नाही.\nगेले अनेक दिवस मये, पेडणे, काणकोण व सावर्डे या प्रमुख मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या वारंवार बैठका झाल्या. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत या सर्व बैठका झाल्या. अखेर काल रविवारी पेडणे, सावर्डे, पर्वरी, सांतआंदे, कुंभारजुवे या मतदारसंघातील उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.\nपर्वरीतून गुरुप्रसाद पावसकरांना उमेदवारी\nपेडणेसाठी राजेंद्र आर्लेकर, सावर्डे मतदारसंघातून गणेश गावकर यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. कुंभारजुवे मतदारसंघात पांडुरंग मडकईकर यांना तर पर्वरी मतदारसंघातून गुरुप्रसाद पावसकर व सांतआंद्रे मतदारसंघात आमदार विष्णू वाघ यांचे बंधू रामराव वाघ यांना उमेदवारी दिली जाणार आहे.\nचर्चेत असलेल्या प्रमुख चार मतदारसंघापैकी पेडणे व सावर्डे या तीन मतदारसंघाबाबत निर्णय घेण्यात आला, मात्र चौथा मतदारसंघ काणकोणबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. काणकोण मतदारसंघाचे नेतृत्त्व क्रीडामंत्री रमेश तवडकर करत आहेत, पण या मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. दीर्घकाळ चर्चेत राहिलेल्या चारही मतदारसंघात मंत्री व आमदार नेतृत्त्व करत होते. पेडणेतून मंत्री राजेंद्र आर्लेकर, काणकोणमधून मंत्री रमेश तवडकर, मये मतदारसंघातून सभापती अनंत शेट व सावर्डेतून आमदार गणेश गावकर नेतृत्त्व करत आहेत. पैकी आर्लेकर, शेट व गावकर यांच्या नावावर उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आहे.\nसांतआंद्रेत रामराव वाघ यांना संधी\nसांतआंद्रे मतदारसंघाचे आमदार विष्णू वाघ आजारी असल्याने या मतदारसंघातून वाघ यांचे बंधू रामराव वाघ यांना उमेदवारी दिली जाणार आहे. त्यांच्या नावावर रविवारच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. केपे मतदारसंघातून प्रकाश वेळीप तर पर्ये मतदारसंघातून विश्वजित कृ. राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.\nमडगाव, फोंडय़ाबाबत अद्याप निर्णय नाही\nदक्षिण गोव्यातील मडगाव व फोंडा या मतदारसंघाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मडगाव मतदारसंघातून दोन, तीन नावावर प्रामुख्याने चर्चा सुरू आहे, तर फोंडा मतदारसंघातील उमेदवारी कुणाला द्यावी याबाबत अद्याप निश्चिती झालेली नाही. नावेली मतदारसंघात अपक्ष उमेदवार आवेर्तान फुर्तादो यांना पाठिंबा देण्याचे निश्चित झाले आहे. अन्य दोन मतदारसंघात अपक्ष उमेदवारानाच पाठिंबा देण्यात येणार आहे. आवेर्तान फुर्तादो यांना भाजपने उमेदवारीची ऑफर दिली होती, पण त्यांनी अनुकुलता दर्शविली नाही.\nकाणकोणचे समुद्रकिनारे पर्यटकांच्या गर्दीने फुलू लागले\nसौर उर्जा धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता\nडिचोली केंद्र शाळेसाठी उद्यापासून प्रखर आंदोलन\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%A0%E0%A5%81%E0%A4%86-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%93/", "date_download": "2018-08-18T10:52:19Z", "digest": "sha1:AYOT6I6KA6B5CSF3DSNKEOOMHDJW4H2A", "length": 7015, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कठुआ प्रकरंणातील बळीची ओळख उघड केल्याबद्दल माध्यमांना नोटीसा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकठुआ प्रकरंणातील बळीची ओळख उघड केल्याबद्दल माध्यमांना नोटीसा\nनवी दिल्ली – कठुआ बलात्कार आणि खून प्रकरणी बळीची ओळख उघड केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने आज प्रसार माध्यमांना नोटिसा जारी केल्या आहेत. जम्मू-काश्‍मीरमधील कठुआ येथे 8 वर्षंच्या एका बालिकेवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला आहे. सदर बालिकेची ओळख उघड केल्याबद्दल तुमच्यावर कारवाई का करू नये यासाठी उच्च्च न्यायालयाने खुलासा मागवणारी नोटीस माध्यमांना जारी केली आहे.\nभटक्‍या बकेरवाल मुस्लिम समाजातील आठ वर्षे वयाच्या एका बालिकेचे कठुआमधील रसना गावाजवळून अपहरण करण्यात आले होते. आठ दिवसांनंतर तिचा मृतदेह त्याच भागात सापडला होता. या प्रकरणी पोलीसांनी एका अल्पवयीनासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हत्या करण्यापूर्वी सदर बालिकेला मादक द्रव्याच्या अमलाखाली ठेवून सामूहिक बलात्कार बलात्कार केल्याचे आरोपपत्रावरून उघड झाले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराष्ट्रकुल स्पर्धा : बॉक्सिंगमध्ये मेरी कोमचा ‘सुवर्ण’पंच\nNext articleपुणे जिल्हा: बाजरी फुलोऱ्यात आल्याने फिरतेय गोफण\n“प्रत्येकाच्या मनात सद्भावना असल्यास देशात सहिष्णुता नांदेल’\nराज्यमंत्री कांबळे यांच्या सोसायटीत घरफोडी\nनिम्म्या कर्नाटकवर दुष्काळाचे सावट; मात्र काही भागांत पूरस्थिती\nकाश्‍मीरमधील ग्रेनेड हल्ल्यात एकाचा मृत्यूू, तिघे जखमी\nछत्तीसगडमध्ये भिंत कोसळून तीन ठार\nसात दिवस केरळमध्ये फोन कॉल आणि मोबाईल डाटा वापर विनामुल्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/israel-pm-benjamin-netanyahu-faces-corruption-charges-police-find-sufficient-evidence-1631478/", "date_download": "2018-08-18T11:10:30Z", "digest": "sha1:W3KGPC2JAJEKKVS2MCHGEOFGY3DLIQBQ", "length": 14153, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "israel pm Benjamin Netanyahu faces corruption charges police find sufficient evidence | इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू गोत्यात भ्रष्टाचाराप्रकरणी खटल्याची शिफारस | Loksatta", "raw_content": "\nबेशिस्त वाहनचालकांना ९१ लाखांचा दंड\nपक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा\nपुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित\nजळगावमध्ये महाजन-खडसे गटबाजीची सर्वत्र बाधा\nएमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल\nइस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू गोत्यात; भ्रष्टाचाराप्रकरणी खटल्याची शिफारस\nइस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू गोत्यात; भ्रष्टाचाराप्रकरणी खटल्याची शिफारस\nदोषी ठरल्यावरच नेतान्याहू यांना राजीनामा देणे बंधनकारक असेल\nइस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू अडचणीत आले आहेत. इस्रायलमधील पोलिसांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी नेतान्याहू यांच्या विरोधात खटला चालवण्याची शिफारस केली असून याबाबतचा अंतिम निर्णय आता अॅटर्नी जनरल घेणार आहेत. मात्र, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नेतान्याहू राजीनामा देणार नाही, ते या पदावर कायम असतील, असे सत्ताधाऱ्यांनी म्हटले आहे.\nभ्रष्टाचाराच्या दोन प्रकरणांमुळे नेतान्याहू अडचणीत आले आहेत. पहिल्या प्रकरणात नेतान्याहू यांनी इस्रायलमधील एका वृत्तपत्राच्या प्रकाशकाला सरकारच्या सकारात्मक बातम्या द्यायला सांगितले होते. तर दुसऱ्या प्रकरणात नेतान्याहू यांनी पदावर असतानाही महागड्या भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप आहे. सिगारेट, शँपेन, ज्वेलरीचा यात समावेश होता. हॉलिवूडमधील ख्यातनाम निर्माता, ऑस्ट्रेलियातील अब्जाधीशाकडून त्यांनी या भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप आहे. नेतान्याहू यांनी तब्बल २ लाख डॉलरपर्यंतच्या भेटवस्तू स्वीकारल्याचे सांगितले जाते. हॉलिवूडमधील निर्मात्याला अमेरिकेचा व्हिसा मिळवून देण्याच्या मोबदल्यात त्यांना या भेटवस्तू मिळाल्याचे सांगितले जाते. या प्रकरणांचा तपास करणाऱ्या इस्रायल पोलिसांनी अखेर पुरावे सापडल्याचा दावा केला आहे. याआधारे नेतान्याहू यांच्याविरोधात खटला चालवावा, अशी शिफारस पोलिसांनी केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सात वेळा नेतान्याहू यांची चौकशी केली होती.\nनेतान्याहू यांच्यावर खटला चालवायचा की नाही याचा अंतिम निर्णय अॅटर्नी जनरल घेणार आहेत. आगामी महिनाभरात चर्चा करुन ते अंतिम निर्णय घेतील, असे इस्रायलच्या माध्यमांनी म्हटले आहे. इस्रायलमधील कायदा मंत्री अॅलेत शकेद यांनी हा खटला चालणार असला तरी पंतप्रधान राजीनामा देणार नाही, असे स्पष्ट केले. तर नेतान्याहू यांनी देखील इस्रायली वृत्तवाहिनीशी बोलताना हे आरोप फेटाळून लावले. भ्रष्टाचाराचे आरोप निराधार आहे. मी जनतेची सेवा करत असून या पासून मला कोणीही रोखू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. ६८ वर्षीय नेतान्याहू यांची पंतप्रधानपदाची ही दुसरी टर्म आहे. नेतान्याहू यांच्यावर गंभीर आरोप आहेत. पंतप्रधानांवर असे आरोप असताना त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केली आहे.या प्रकरणात दोषी ठरल्यावरच नेतान्याहू यांना राजीनामा देणे बंधनकारक असेल, असे सूत्रांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n पिंपरीत पित्याने दोन मुलांची हत्या करुन केली आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nIt's Official: नात्यावर शिक्कामोर्तब करत अखेर निक-प्रियांका म्हणाले....\nसहजीवनाचा पहिला टप्पा सर, थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा\nइम्रान खानच्या शपथविधीला सिद्धूंना मानाचे स्थान, घेतली लष्करप्रमुखांची गळाभेट\nमिनी एसयुव्हीसारखं डिझाईन असलेली नवीन रेनाँ क्विड वसूल करते तुमचा पै न पै\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nअंतर्गत वाहतुकीसाठी ट्रामचा पर्याय\nवाहनांना एक टोल माफ\nरेल्वेचे संगणकीय आरक्षण केंद्र पावणेतीन तास बंद राहणार\nस्वानंद देणारे शिक्षण निवडा\nवामनदादा कर्डकांना शाहिरीतून अभिवादन\nभूगावमधील हॉटेलमध्ये कोंबडय़ांच्या झुंजीवर जुगार\nपाणी पुरेना आणि म्हणे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navneet-news/xavier-linguistic-miracle-1631276/", "date_download": "2018-08-18T11:10:34Z", "digest": "sha1:WZHPOIZYTFDQOUNXKGEYILDI5XDMNTGQ", "length": 13188, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Xavier Linguistic Miracle | जे आले ते रमले.. : झेवियरचा भाषिक चमत्कार | Loksatta", "raw_content": "\nबेशिस्त वाहनचालकांना ९१ लाखांचा दंड\nपक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा\nपुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित\nजळगावमध्ये महाजन-खडसे गटबाजीची सर्वत्र बाधा\nएमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल\nजे आले ते रमले.. : झेवियरचा भाषिक चमत्कार\nजे आले ते रमले.. : झेवियरचा भाषिक चमत्कार\nगोव्यात प्रथम १५१० साली डोमिनिकन पंथाचे मिशनरी आले.\nहिंदुस्थानात आलेल्या सुरुवातीच्या परकीयांपैकी स्थानिक भाषा आत्मसात करून त्यांच्यात पांडित्य मिळवणाऱ्यांत ख्रिश्चन मिशनरी अग्रेसर होते. त्यातील अनेकांनी त्या भाषांमध्ये ग्रंथलेखन केले आणि छपाईयंत्र हिंदुस्थानात आणून स्थानिक भाषेतील पहिली ग्रंथछपाईही या मिशनऱ्यांनीच केली काही मिशनऱ्यांनी तर आपले ख्रिस्ती धर्मप्रसाराचे काम बाजूला सारून स्थानिक भाषांमधील साहित्य लेखन, संकलन आणि व्याकरणाचे सुसूत्रीकरण या कामालाच स्वत:ला वाहून घेतले\nखरं तर या मिशनऱ्यांनी स्थानिक भाषा शिकून त्यांत साहित्यनिर्मिती केली यामागचा त्यांचा अंत:स्थ हेतू धर्मप्रसार हाच होता. पोर्तुगीजांनी सुरुवातीला केरळ आणि गोव्यातल्या लोकांना अनेक प्रकारची आमिषे दाखवून, काही वेळा सक्ती आणि छळ करून ख्रिस्ती धर्म स्वीकारावयास लावला. परंतु या मार्गाने पोर्तुगीजांना हवे तसे यश मिळाले नाही. धर्मप्रसाराचे धोरण ठरविण्यासाठी बिशपांच्या प्रांतिक सभा म्हणजे कौन्सिल भरत असत. इ.स. १५८५ मध्ये भरलेल्या कौन्सिलने एक मार्गदर्शक ठराव मंजूर केला. या ठरावानुसार गोव्यातल्या मिशनऱ्यांनी गोव्याची भाषा म्हणजे कोकणी आणि मराठी भाषा आत्मसात करून ख्रिस्ती धर्माची तत्त्वे विशद करणाऱ्या लहान प्रश्नोत्तर रूपातल्या पुस्तिका आणि इतर विषयांवरचे ग्रंथ तयार केले. त्याचप्रमाणे ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी कोकणी आणि मराठी भाषा शिकून लोकांशी या भाषांमध्येच संभाषण सुरू केले.\nगोव्यात प्रथम १५१० साली डोमिनिकन पंथाचे मिशनरी आले. नंतर पुढे १५१७ मध्ये फ्रान्सिस्कन आले आणि १५४२ मध्ये फ्रान्सिस झेवियर हा जेसुइट मिशनरी आला. झेवियरने मलबारात आणि गोव्यात ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्यासाठी एका दुभाषाकडून स्थानिक भाषेत प्रश्नोत्तरावलींचे भाषांतर करवून घेतले. झेवियर प्रचारासाठी जाई तेव्हा घंटा वाजवून लोकांना गोळा करी आणि मोडक्यातोडक्या मल्याळी भाषेत धर्मोपदेश करी. झेवियर स्थानिक भाषा शिकला नाही याबाबत लोक एक अद्भुत कारण सांगतात. ते असे की फ्रान्सिसला बहुभाषिकत्वाची देणगी मिळाली होती. तो जाई तिथे पोर्तुगीज भाषेतच बोलत असे, पण लोकांना मात्र त्यांच्या स्थानिक भाषेतच ऐकू जाई\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n पिंपरीत पित्याने दोन मुलांची हत्या करुन केली आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nIt's Official: नात्यावर शिक्कामोर्तब करत अखेर निक-प्रियांका म्हणाले....\nसहजीवनाचा पहिला टप्पा सर, थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा\nइम्रान खानच्या शपथविधीला सिद्धूंना मानाचे स्थान, घेतली लष्करप्रमुखांची गळाभेट\nमिनी एसयुव्हीसारखं डिझाईन असलेली नवीन रेनाँ क्विड वसूल करते तुमचा पै न पै\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nअंतर्गत वाहतुकीसाठी ट्रामचा पर्याय\nवाहनांना एक टोल माफ\nरेल्वेचे संगणकीय आरक्षण केंद्र पावणेतीन तास बंद राहणार\nस्वानंद देणारे शिक्षण निवडा\nवामनदादा कर्डकांना शाहिरीतून अभिवादन\nभूगावमधील हॉटेलमध्ये कोंबडय़ांच्या झुंजीवर जुगार\nपाणी पुरेना आणि म्हणे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE.html", "date_download": "2018-08-18T11:07:48Z", "digest": "sha1:GQOFSFUGGFBLDNGKFH57T2PEEHQ3PPVQ", "length": 27759, "nlines": 297, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | बिहारात नरेंद्र मोदींचा झंझावात", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, बिहार, राज्य » बिहारात नरेंद्र मोदींचा झंझावात\nबिहारात नरेंद्र मोदींचा झंझावात\nपूर्ण ताकदीने प्रचारात उतरविणार\nनवी दिल्ली, [७ ऑक्टोबर] – बिहारमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या प्रचाराचा मुख्य जोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभांवर राहणार आहे. बिहारची निवडणूक भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणि नेतृत्वात लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे ते स्वाभाविकही आहे. मोदी भाजपाचे मुख्य स्टार प्रचारक आहेत. भाजपाने बिहारमध्ये मोदी यांच्या ४० जाहीरसभा करण्याचे नियोजन केले आहे.\nयेत्या काही दिवसांत भाजपा बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारसभांची रणधुमाळी उडवून देण्याच्या तयारीत आहे. बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होत असलेल्या भागात उद्या ८ ऑक्टोबरला मोदी यांच्या ५ सभांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात बिहारमध्ये ४५ मतदारसंघात १२ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या भागातील प्रचार १० ऑक्टोबरला संपेल. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपा या भागात पंतप्रधान मोदी यांना उतरवून वातावरण आपल्या बाजूने करण्याच्या प्रयत्नात आहे.\nमहाराष्ट्र, झारखंड, हरयाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचारात उतरवले होते. विशेष म्हणजे या चार राज्यात भाजपाने आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. भाजपाने या चारही राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडणूक लढवली होती, आणि ती जिंकलीही होती.\nमहाराष्ट्रात मागील वर्षी १५ ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक झाली होती. या निवडणुकीत मोदी यांनी प्रचाराचा झंझावात उभा केला होता. ४ ते १३ ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात मोदी यांच्या २५ जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या. यातील नाशिकची सभा प्रचंड पावसामुळे रद्द करावी लागली. उर्वरित २४ सभा मोदी यांनी घेत वातावरण भाजपाच्या बाजूला वळवले होते. १२ आणि १३ ऑक्टोबरला मोदी यांनी ८ सभा घेतल्या होत्या. मोदी यांच्या प्रचारामुळेच भाजपाला राज्यात प्रथमच सर्वाधिक जागा मिळाल्या आणि शिवसेनेच्या मदतीने भाजपा राज्यात सत्तेवर आली. बिहारप्रमाणेच जम्मू काश्मिरात २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०१४ या काळात ५ टप्प्यात मतदान झाले होते. २२ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या काळात पंतप्रधान मोदी यांनी राज्यात ९ सभा घेतल्या. मोदी यांच्या जम्मू, श्रीनगर, उधमपूर, कठुआ, पूंछ, सांबा, किश्तवाड, राजौरी आणि बिलावल येथे सभा झाल्या. या सभामुळेच कधी नव्हे ते राज्यात भाजपाला दुसर्‍या क्रमांकाच्या जागा मिळाल्या. महाराष्ट्राप्रमाणे काश्मिरातही भाजपाने पीडीपीच्या मदतीने सरकार बनवले.\nझारखंडमध्येही मागीलवर्षी २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०१४ या काळात ५ टप्प्यात मतदान झाले. पंतप्रधान मोदी यांनी राज्यात ६ दिवसांत ९ जाहीरसभा घेत भाजपाला सत्तेवर आणले. हरयाणातही १५ ऑक्टोबरला मतदान झाले होते. हरयाणात मोदी यांच्या एकूण ११ सभा झाल्या. ८ ऑक्टोबरला मोदी यांनी ४ प्रचारसभांना संबोधित केले. हरयाणातही भाजपाने स्वबळावर सरकार स्थापन केले.\nप्रचाराचा हाच फॉर्म्युला बिहारमध्ये वापरण्याची भाजपाची योजना आहे. बिहारमध्येही पाच टप्प्यांत मतदान होत आहे. पहिला टप्प्यातील प्रचार संपायला आता फक्त तीन दिवस उरले आहेत. मात्र, मतदानाच्या प्रत्येक टप्प्यात बिहारमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या आठ ते दहा सभा घेण्याची योजना भाजपाने आखली आहे. बिहारमध्ये निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधी पंतप्रधान मोदी यांच्या चार मोठ्या सभा झाल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी बिहारची विधानसभा निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळेच त्यांनी बिहारच्या विकासासाठी सव्वा लाख कोटी रुपयांचे पॅकेजही घोषित केले आहे. याशिवाय राज्यातील अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ४० हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना पूर्ण ताकदीने प्रचारात उतरवण्याची भाजपाशी योजना आहे. मोदी प्रचारात उतरल्यावर राज्यातील वातावरण पूर्णपणे भाजपामय झालेले असेल आणि भाजपाचे ‘मिशन १८५’ यशस्वी होईल, असा भाजपा नेत्यांचा विश्‍वास आहे.\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nवैयक्तिक, औद्योगिक कर कमी करणार: अरुण जेटली\nन्यूयॉर्क, [७ ऑक्टोबर] - येत्या काळात वैयक्तिक कराचे प्रमाण कमी करून योग्य स्तरावर आणण्यात येतील. तसेच येत्या चार वर्षांत औद्योगिक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/component/tags/tag/rajesh-shringarpure", "date_download": "2018-08-18T10:36:57Z", "digest": "sha1:QNSUQ5TQIPEPXR6XF27XWI6PHNCDLVCY", "length": 4769, "nlines": 161, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Rajesh Shringarpure - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'बिग बॉस मराठी' च्या घरामध्ये 'जुई गडकरी' ने वापरला पाटा वरवंटा\n'राजेश श्रृंगारपुरे' शिकवणार गोटयांचा खेळ\n‘गोटया’ चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा\nबिग बॉस च्या घरामधील २२ वा दिवस - रेशम किंवा राजेश मधून कोण जाणार घरामधून बाहेर\nबिग बॉस च्या घरामधील २७ वा दिवस - राजेशला सिक्रेट रूममध्ये का रडू कोसळले\nबिग बॉस च्या घरामधील २९ वा दिवस - अज्ञातवासातला प्रवास संपवून राजेश घरामध्ये परतणार\nबिग बॉस च्या घरामधील नववा दिवस - “खुर्ची सम्राट” च्या खेळात मोठा राडा\nमोठ्या पडद्यावर लवकरच साजरा होणार 'शिमगा'\nराजेश शृंगारपुरे 'बिग बॉस मराठी' च्या घरामधून बाहेर\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\nतीच धम्माल मस्ती घेऊन पुन्हा येतोय 'बॉईज 2' ५ ऑक्टोबरपासून\n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेमधील हरहुन्नरी लक्ष्मी म्हणजेच अभिनेत्री 'समृद्धी केळकर' झाली \"कथ्थक विशारद\"\n'अमेय वाघ' करणार 'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स' चं सूत्रसंचालन\n\"अंजली स्वीकारणार सईचं आव्हान\" - पहा 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेचा २ तासांचा विशेष भाग १९ ऑगस्टला\nSony Pictures Network चे मराठी मनोरंजन क्षेत्रातले पहिले पाऊल - Sony मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://aboutmaharashtra.blogspot.com/2011/10/online-application-for-maharashtra.html", "date_download": "2018-08-18T11:07:43Z", "digest": "sha1:FUJWS5VVYSBNLWJZOBTMEQQ2MSVWWRRO", "length": 16666, "nlines": 143, "source_domain": "aboutmaharashtra.blogspot.com", "title": "Maharashtra Information: Maharashtra Police Recruitment 2018- ASI Constable Clerk SI Vacancies in Maharashtra Police 2018", "raw_content": "\n1. मी ऑनलाईन अर्ज कसा करावा \nmahapolice.mahaonline.gov.in या पोर्टलवर जा, सूचना या टॅबवर क्लिक करा. सूचना काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर नोंदणी वर क्लिक करा, आवश्यक तपशील भरा आणि 'नोंदणी करा' वर क्लिक करा. तुमच्या ई-मेल आयडी वर एक पडताळणी दुवा पाठवला जाईल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही मुख्य पृष्ठावर पोहोचाल. आता ई मेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा आणि परीक्षेसाठी अर्ज करा.\n2. उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज भरू शकतो का\nनाही, प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे.\n3. मला परीक्षा शुल्क भरणा कशा प्रकारे करता येईल\nऑनलाईन अर्ज भरताना खालीलपैकी कोणत्याही पर्यायाची निवड करून आपण परीक्षा शुल्क भरणा करू शकता.\nऑनलाईन भरणा - पेमेंट गेटवेच्या माध्यमातून\nचलान द्वारे भरणा - स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेतून रोख भरणा\nमहा ई-सेवा केंद्रात जाऊन पूर्ण अर्ज भरावे आणि मग शुल्क भरावे.\nPayTM च्या माध्यमातून .\n4. ऑनलाईन भरणा करताना माझ्या संगणकाचा विद्युत पुरवठा/इंटरनेट जोडणी खंडित झाली. मी काय करावे\nतुम्ही पुन्हा ऑनलाईन याल, तेव्हा अर्ज करा या मेनुमधील शुल्क भरणा पर्याय निवडा, तुमच्या टोकन क्रमांकाची नोंद करून तुमची शुल्क भरणा स्थिती तपासा.\nभरणा प्राप्त झाल्यास तुम्ही आवेदन अर्ज प्रिंट करण्याची प्रक्रिया पुढे सुरू ठेवू शकता.\nभरणा प्राप्त न झाल्यास तुम्हाला भरणा प्रक्रिया पुन्हा सुरू करावी लागेल. (ऑनलाईन अथवा चलान चा पर्याय निवडा)\n5. मला बँक चलान हा पर्याय निवडायचा असल्यास, मी अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे पूर्ण करावी \nऑनलाईन आवेदन अर्जात विचारलेली सर्व माहिती भरल्यानंतर बँक चलान हा पर्याय निवडा आणि खालील सूचनांचे पालन करून भरणा प्रक्रिया पूर्ण करा.\nस्टेट बँक ऑफ इंडियाच्या चलानची प्रिंट घ्या.\nचलानची प्रिंट घेऊन दोन तासानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जा आणि शुल्क भरणा करा.\n1-2 दिवसांत भरणा स्थिती अद्ययावत होईल.\n6. अर्ज प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात माझ्या ऑनलाईन आवेदन अर्जाची प्रिंट घ्यायचे राहून गेले. मला ती कशा प्रकारे प्राप्त करता येईल\nतुम्ही ई मेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करू शकता आणि प्रिंट घेऊ शकता.\n7. मी आवेदन अर्ज भरला, शुल्क भरणा प्रक्रियासुद्धा पूर्ण केली, मात्र आता मला परीक्षा द्यायची नाही. मला अर्ज शुल्क परत मिळेल काय \nनाही. कोणत्याही परिस्थितीत अर्ज शुल्क परत मिळणार नाही.\n8. ऑनलाईन भरती अर्ज प्रक्रियेअंतर्गत मी अनेक मोड्युल्समध्ये माहितीची नोंद करीत आहे. आणि प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. मला एका/अनेक रकान्यांमधल्या माहितीमध्ये बदल करायचा आहे. मला ते कसे करता येईल \nतुम्ही ऑनलाईन भरती प्रक्रियेअंतर्गत अर्ज सादर करण्यापूर्वी विविध मोड्युल्समधील माहिती अद्ययावत/ बदल करू शकता (नोंदणी तपशील वगळता). यंत्रणेमार्फत तुम्हाला पूर्ण केलेल्या अर्जाचे पूर्वदृश्य दर्शविले जाईल. ही माहिती योग्य असल्याची खातरजमा केल्यानंतरच तुम्ही ऑनलाईन भरती प्रक्रियेअंतर्गत तुमचा अर्ज सादर करावा. एकदा अर्ज सादर केल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही.\n9. स्कॅन केलेले छायाचित्र आणि स्वाक्षरी कोणत्या फॉर्मॅटमध्ये असावे\nछायाचित्र आणि स्वाक्षरी जेपीईजी/पीएनजी/टीआयएफएफ स्वरूपातच स्कॅन करणे आवश्यक आहे.\n10. ज्या पदासाठी मी माझा ऑनलाईन आवेदन अर्ज यशस्वीरित्या सादर केला आहे, त्याच्या भरतीसंदर्भातील शंकांसाठी मी कोठे संपर्क साधावा\nतुम्ही mahapolice.support@mahaonline.gov.in येथे ई-मेल द्वारे अथवा 9015978978 या आमच्या मदत कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू सकता.\n11. मी पासवर्ड विसरलो/विसरले तर \nमुख्य पृष्ठावरील पासवर्ड विसरलात या दुव्यावर क्लिक करा आणि इच्छित माध्यम, ईमेल आयडी पर्याय निवडा.\nसादर करा वर क्लिक केल्यानंतर तुम्ही नोंदणी केलेल्या ईमेल आयडीवर एक ओटीपी संकेतांक प्राप्त होईल.\nअन्यथा 9015978978 ह्या दूरध्वनी क्रमांकावर आपल्या अर्जामध्ये नमूद केलेल्या भ्रमणध्वनीवरून संपर्क साधा\n12. चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला गेल्यास मला तो रद्द करून पुन्हा नोंदणी करता येईल काय\nहोय. अर्ज रद्द करा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही अर्ज रद्द करू शकता. मात्र शुल्क भरणा केल्यानंतरच हा पर्याय उपलब्ध होईल, त्यामुळे तुम्हाला अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावीच लागेल. योग्य कारण देऊन तुम्ही अर्ज रद्द करू शकता आणि पुन्हा ई मेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा आणि परीक्षेसाठी अर्ज करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://shatadapremkarave.blogspot.com/2008/03/blog-post_8967.html", "date_download": "2018-08-18T10:48:25Z", "digest": "sha1:RP62EUXGWJE72HHDQYXKDX45JL4OQDKP", "length": 2778, "nlines": 54, "source_domain": "shatadapremkarave.blogspot.com", "title": "शतदा प्रेम करावे: आयुष्य", "raw_content": "\nनमस्कार मित्रानो. मी अनिल बिहाणी . मझ्याबाबातीत सांगण्यासारखे विशेष काहिच नाहि.मी एक् सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य मुलगा आहे.पण प्रत्येक समान्यात कुठे तरि असामन्यत्व द्डलेलं असतं.माझ्यातल्या या असामान्यत्वाचा शोध् घेणे सद्या सुरु आहे.\nनुकतीच कुठे आयुश्याची सुरुवात होती\nपुस्तकाच्या पहिल्याच पानावर शेवटाची बात होती\nसुर्य डोक्यावर आलेला अन् लख्ख उजाडलेले\nमनाच्या गाभाऱ्यात मात्र आवसेची रात होती\nसमजुन फूले ज्यांना मी होते केसात माळले\nउमगले मज नंतर काट्याची ती जात होती\nआयुश्याची लक्तरे अन जीवनाची झालेली दशा\nखडतर या वाटेवरती फ़क़्त दुःखाचीच साथ होती\nआयुश्याच्या या दिपामध्ये काठोकाठ तेल भरलेले\nमिणमिणनाऱ्या या दिपामधली सम्पलेली वात होती .\nजय हो तेरी गोविंदा ......\nही वाट दूर जाते .......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/600647", "date_download": "2018-08-18T10:27:03Z", "digest": "sha1:BEJLKKVZ7QPBUVNU2HHICTSWOCKCQQXX", "length": 6261, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "इंग्रजी बोलता येत नाही म्हणून सासरच्यांकडून छळ झाल्याने सुनेची आत्महत्या - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » इंग्रजी बोलता येत नाही म्हणून सासरच्यांकडून छळ झाल्याने सुनेची आत्महत्या\nइंग्रजी बोलता येत नाही म्हणून सासरच्यांकडून छळ झाल्याने सुनेची आत्महत्या\nऑनलाईन टीम / पुणे :\nसुनेला इंग्रजी बोलत येत नाही म्हणून सासरच्या मंडळींनी सुनेला मानसिक त्रास देत तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणावरून वाकड पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. गुरूवारी पीडित नवविवाहित महिलेने गळफास घेऊन आपल जीवन संपवले.\nसारिका उर्फ प्रतीक्षा गणेश पाटील असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मयत महिलेचा भाऊ रवींद्र गलांडे याने पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली आहे. वाकड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. सविस्तर माहिती अशी की, मयत सारिका उर्फ प्रतीक्षा हीचा विवाह गणेश डांगे पाटील याच्याशी दोन महिन्यांपूर्वी झाला होता. गणेश हा पिंपरी-चिंचवड मध्ये चालक म्हणून काम करतो. पती गणेश, सासू, नणंद हे सारीकाला इंग्रजी बोलता येत नाही म्हणून वारंवार त्रास देत होते. तसेच लग्नापूर्वी तिच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेची माहिती दिली नाही या मुद्यावरून तिला मानसिक त्रास देत होते. या विषयी दोन दिवस अगोदर तिने भाऊ रवींद्र गलांडे याला फोनवरून माहिती दिली होती. गुरूवारी दुपारी पती गणेश कामावर तर सासू ही घराबाहेर असताना मानसिक त्रासाला कंटाळून राहत्या सारिकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास वाकड पोलीस करत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.\nअरुणाचलमध्ये दहशतवादी चकमक ; 2 जवान शहीद\nमुंबईतल्या 7 रेल्वे स्टेशनची नावं बदलण्याची शिवसेनेची मागणी\nआर. के. स्टुडिओची आग आटोक्यात\nन्यायाधीशांचा वाद मिटला नाही : के.के वेणुगोपाळ\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/hand-blender/cheap-euroline+hand-blender-price-list.html", "date_download": "2018-08-18T10:09:35Z", "digest": "sha1:XBWAPI3QBQQSWHHLV3NWSP4ZMCYXOXAU", "length": 17559, "nlines": 488, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये यूरोळीने हॅन्ड ब्लेंडर | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap यूरोळीने हॅन्ड ब्लेंडर Indiaकिंमत\nस्वस्त यूरोळीने हॅन्ड ब्लेंडर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त हॅन्ड ब्लेंडर India मध्ये Rs.725 येथे सुरू म्हणून 18 Aug 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. यूरोळीने एल 180 180 W हॅन्ड ब्लेंडर Rs. 900 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये यूरोळीने हॅन्ड ब्लेंडर आहे.\nकिंमत श्रेणी यूरोळीने हॅन्ड ब्लेंडर < / strong>\n0 यूरोळीने हॅन्ड ब्लेंडर रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 600. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.725 येथे आपल्याला यूरोळीने एल 112 200 W हॅन्ड ब्लेंडर उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 12 उत्पादने\nशीर्ष 10यूरोळीने हॅन्ड ब्लेंडर\nयूरोळीने एल 112 200 W हॅन्ड ब्लेंडर\nयूरोळीने एल 112 250 W हॅन्ड ब्लेंडर\nयूरोळीने एल्११२ 250 W हॅन्ड ब्लेंडर\n- पॉवर कॉन्सुम्पशन 250 W\nयूरोळीने एल 180 180 W हॅन्ड ब्लेंडर\nयूरोळीने एल्११५ 250 W हॅन्ड ब्लेंडर\n- पॉवर कॉन्सुम्पशन 250 W\nयूरोळीने एल 115 250 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 250 W\nयूरोळीने एल 186 250 W हॅन्ड ब्लेंडर\nयूरोळीने एल 108 450 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 450 W\nयूरोळीने एल 108 हॅन्ड ब्लेंडर\n- पॉवर कॉन्सुम्पशन 450 W\nयूरोळीने यूरोळीने एल 108 450 W चॅप्पेर व्हाईट 450 W हॅन्ड ब्लेंड\nयूरोळीने एल्१२८ 600 W हॅन्ड ब्लेंडर\nयूरोळीने एल 191 250 व हॅन्ड ब्लेंडर\n- पॉवर कॉन्सुम्पशन 250 W\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://diamondbookspune.com/categorydet1.php?cat=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-08-18T09:58:50Z", "digest": "sha1:4RXSLXUVGEG4EBT4LFNUM5HRC3SWKOPH", "length": 3116, "nlines": 78, "source_domain": "diamondbookspune.com", "title": "Welcome to Diamond Publications", "raw_content": "\nशारीरिक शिक्षण व खेळ\nसमाजशास्त्र ललित अर्थशास्त्र वाणिज्य-व्यवस्थापनशास्त्र\nइतिहास व्यक्तिमत्त्व विकास चरित्रे-आत्मचरित्रे पत्रकारिता-प्रसारमाध्यमे\nराज्यशास्त्र कविता संग्रह भूगोल धार्मिक\nमानसशास्त्र मराठी साहित्य पर्यावरण ग्रंथालय-माहितीशास्त्र\nस्पर्धा परीक्षा बाल-कुमार वाङमय आपत्ती व्यवस्थापन संगीत\nआरोग्य क्रमिक पुस्तके नाटकं आयुर्वेद\nअनुवादित पुस्तके बेस्टसेलर्स विज्ञानविषयक ज्योतिष\nकथा कोशवाङमय शिक्षणशास्त्र English Literature\nकादंबरी स्त्रीविषयक शारीरिक शिक्षण व खेळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE.html", "date_download": "2018-08-18T11:03:36Z", "digest": "sha1:6YE7XQLN2PCD55KJVIJDC7MJU64WZQ7Q", "length": 22319, "nlines": 292, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | अकबर रोडला महाराणा प्रताप यांचे नाव द्या !", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » अकबर रोडला महाराणा प्रताप यांचे नाव द्या \nअकबर रोडला महाराणा प्रताप यांचे नाव द्या \nनवी दिल्ली, [१८ मे] – काही महिन्यापूर्वीच दिल्लीच्या मध्यवर्ती भागातील औरंगजेब रोडला दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचं नाव देण्यात आलं. या पार्श्‍वभूमीवर आता दिल्लीतील प्रसिद्ध अकबर रोडला महाराणा प्रताप सिंह यांचं नाव देण्याची मागणी परराष्ट्र राज्य मंत्री व्ही. के. सिंह यांनी केली आहे.\nमहाराणा प्रताप यांनी मुघल बादशहा अकबरला रोखण्यात महत्वाची भूमिका निभावली होती. एक सच्चा धर्मनिरपेक्ष आणि रयतेचा राजा अशी त्यांची ओळख होती. तसेच त्यांच्या सैन्यात पठाण, भील्ल आणि आदिवासी अशा समाजातील विविध घटकांना स्थान होतं. व्ही. के. सिंह यांनी नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून त्यात नमूद केलं आहे की, महाराणा प्रताप याचं व्यक्तिमत्व अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यामुळे अकबर रोडचं ‘महाराणा प्रताप मार्ग’ असं झाल्यास तो त्यांचा सन्मान ठरेल.\nविशेष म्हणजे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्‌टर यांनी व्ही. के. सिंह यांनी अकबर रोडचं महाराणा प्रताप मार्ग असं नामकरण करण्यासाठी पाठपुरावा करावा. असे आवाहन केलं होतं. त्यानंतर सिंह यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच यापूर्वी सुब्रमण्यम स्वामी यांनीही ही मागणी केली होती. दुर्देवाने महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज या ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचा योग्य तो सन्मान आतापर्यंत होऊ शकलेला नाही. अशी खंतही सिंह यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे.\nदरम्यान, दिल्लीत सुमारे ३३ रस्त्यांना मुघल शासनकर्त्यांची नावे असल्याकडेही स्वामी यांनी लक्ष वेधलं होतं.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (325 of 2453 articles)\n=मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना साकडे= नवी दिल्ली, [१८ मे] - दोन वर्ष ‘नीट’ लागू करू नये, सीईटीच राहू द्यावी, असे साकडे मुख्यमंत्री ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/609533", "date_download": "2018-08-18T10:24:06Z", "digest": "sha1:PC6OEVB37JUEW333HQPWK5YJ3KN3MZDL", "length": 6660, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "इतक्या वर्षाचा जलसंधारणाचा पैसा गेला कुठे - राज ठाकरे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » इतक्या वर्षाचा जलसंधारणाचा पैसा गेला कुठे – राज ठाकरे\nइतक्या वर्षाचा जलसंधारणाचा पैसा गेला कुठे – राज ठाकरे\nऑनलाईन टीम / पुणेः\nआत्तापर्यंत सत्तेत असलेल्या सर्व पक्षांचे नेते इथे बसले आहेत. पानी फाऊंडेशनच्या कामामुळे जर जलसंधारणचे काम होऊ शकते तर इतक्मया वर्षाचा जलसंधारणाचा पैसा गेला कुठे असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.\n1) पहिले पारितोषिक – टाकेवाडी, माण सातारा\n1) सिडखेड, मोताळा, बुलढाणा\n2) भांडवली, माण, सातारा\n1) आनंदवाडी, आष्टी, बीड\nपानी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप सोहळय़ात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जलसंधारण मंत्री राम शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, अभिनेता आमिर खान, किरण राव, पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ आदी उपस्तिथ होते. गावातल्या लोकांना जागृत करण्याचं काम आमिर खान करत असेल तर सरकार काय करतं असेही राज ठाकरे म्हणाले. राज यांनी आपल्या मनोगतात चौफेर टीका केली. राज म्हणाले, जलसंधारणामध्ये जेवढं पाणी मुरलं तेवढ्यात राज्यातील दुष्काळ नाहीसा झाला असता. पानी फाऊंडेशन मध्ये सरकारी अधिकारी काम करतात तर, सरकारच्या कामात सरकारी अधिकारी काम का करत नाहीत आमिर खान कधी कुठला पुरस्कार घेत नाही. मात्र मॅगसेस पुरस्कार मिळेल तेव्हा तो नक्की घेईल. प्रेक्षकांनी तुम्ही श्रमदानासाठी कधी येणार असा प्रश्न केला असता श्रमदानासाठी नक्की येईल सरकार मध्ये नसल्याने मला फावडं कसं चालवायचं हे माहित नाही तेवढं नक्की शिकवा.\nउद्योजक सीताराम चव्हाण यांचे निधन\nवैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेची एसआयटी चौकशी नाही : सर्वोच्च न्यायालय\nकाँग्रेसला ‘गँड ओल्ड अँड यंग पार्टी’ बनवणार : राहुल गांधी\nमराठी मनोरंजन क्षेत्रात ‘एसपीएन’ चे पहिले पाऊल\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/manav-thakkar-olympic-selection-table-tennis-115053", "date_download": "2018-08-18T10:28:43Z", "digest": "sha1:5ORWAVBD64UGALNOZL5USSEZIFXDAGTJ", "length": 11442, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "manav thakkar olympic selection for table tennis टेबल टेनिसपटू मानव ठक्कर युवा ऑलिंपिकसाठी पात्र | eSakal", "raw_content": "\nटेबल टेनिसपटू मानव ठक्कर युवा ऑलिंपिकसाठी पात्र\nबुधवार, 9 मे 2018\nबॅंकॉक - भारताचा टेबल टेनिसपटू मानव ठक्कर याने अर्जेंटिनात होणाऱ्या युवा ऑलिंपिकसाठी मंगळवारी आपले तिकीट निश्‍चित केले. त्याने पात्रता फेरीत सिंगापूरच्या शाओ जोश चुआ याचा ४-० असा पराभव करून ही पात्रता सिद्ध केली. मानव कुमार गटात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने चुआचा ११-४, ११-७, ११-२, ११-९ असा पराभव केला. भारताच्या अर्चना कामथ याची ऑलिंपिक वारी मात्र तिसऱ्यांदा हुकली. तिला उपांत्यपूर्व फेरीत हंगेरीच्या फानी हॅराझटोविचकडून ३-४ असा पराभव पत्करावा लागला. आपल्या उपलब्धीबद्दल मानव म्हणाला, ‘‘यापूर्वी तीनवेळा माझी संधी हुकली होती. या वेळी मी पात्र ठरलो. खूप आनंद झाला आहे.\nबॅंकॉक - भारताचा टेबल टेनिसपटू मानव ठक्कर याने अर्जेंटिनात होणाऱ्या युवा ऑलिंपिकसाठी मंगळवारी आपले तिकीट निश्‍चित केले. त्याने पात्रता फेरीत सिंगापूरच्या शाओ जोश चुआ याचा ४-० असा पराभव करून ही पात्रता सिद्ध केली. मानव कुमार गटात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने चुआचा ११-४, ११-७, ११-२, ११-९ असा पराभव केला. भारताच्या अर्चना कामथ याची ऑलिंपिक वारी मात्र तिसऱ्यांदा हुकली. तिला उपांत्यपूर्व फेरीत हंगेरीच्या फानी हॅराझटोविचकडून ३-४ असा पराभव पत्करावा लागला. आपल्या उपलब्धीबद्दल मानव म्हणाला, ‘‘यापूर्वी तीनवेळा माझी संधी हुकली होती. या वेळी मी पात्र ठरलो. खूप आनंद झाला आहे. प्रशिक्षक मॅसिमो कॉस्टन्टिनी यांचा यात मोठा वाटा आहे.’’\nपुन्हा माझा बळी देऊ नका - सतेज पाटील\nकोल्हापूर - ‘माझ्यासह कार्यकर्त्यांच्या गाफीलपणामुळे मागील निवडणुकीत माझा बळी गेला. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा माझा बळी देऊ नका’, अशा इशारा...\nटेनिसपटू पेसची अखेर माघार\nनवी दिल्ली - दुहेरीतील दिग्गज टेनिसपटू लिअँडर पेसने आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली. पसंतीचा जोडीदार न मिळाल्यामुळे हा कटू निर्णय घ्यावा...\nदुखापत आणि चित्रपटामुळे कुस्तीकडे दुर्लक्ष - गीता\nविजयानगर - सततची दुखापत आणि चित्रपटामुळे आपल्या कारकिर्दीवर परिणाम झाल्याचे मान्य करून अनुभवी महिला कुस्तीगीर गीता फोगट हिने आता आपण पुन्हा कुस्तीवर...\nमॅसन, ओहायो - सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने फ्रान्सच्या ॲड्रीयन...\nआशियाई कबड्डीतूनही गेहलोतशाही संपुष्टात\nमुंबई - भारतीय कबड्डी महासंघावरील गेहलोतशाही दिल्ली उच्च न्यायालयाने बरखास्त केल्यावर आता आशियाई कबड्डीतूनही गेहलोतशाही संपुष्टात येण्याची शक्‍यता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2010/11/", "date_download": "2018-08-18T10:50:49Z", "digest": "sha1:QC6BCTLBOXTKAHVLGBMZF6Q7QTKOD3YF", "length": 10398, "nlines": 189, "source_domain": "kayvatelte.com", "title": "November | 2010 | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n हा मुद्दा कोण उचलणार\n मनसे, शिवसेनेचे कार्यकर्ते आहात काय म्हणताय- उत्तर होय असं आहे काय म्हणताय- उत्तर होय असं आहे बरं अजून एक प्रश्न कधी छत्रपती शिवाजी टर्मीनसला गेले आहात का बरं अजून एक प्रश्न कधी छत्रपती शिवाजी टर्मीनसला गेले आहात का कधी त्या भव्य इमारतीसमोर उभे राहून त्या इमारती कडे डॊळे भरून पाहीले आहे कधी त्या भव्य इमारतीसमोर उभे राहून त्या इमारती कडे डॊळे भरून पाहीले आहे\nसेन्सॉरशिप चा खरा अर्थ मला २५ जुन १९७५ ला समजला. माझं वय साधारण १५ असेल तेंव्हा. सकाळी नेहेमीच्या सवयीप्रमाणे पेपरकडे झेप घेतली. आमच्या घरी तेंव्हा तरूण भारत यायचा- ( नागपूरला अजूनही तरूण भारतच घेतात माझे वडील) . पेपर उघडला आणि … Continue reading →\nPosted in मनोरंजन\t| Tagged टिव्ही, न्युडीटी टीव्ही, बिग बॉस, राखी सावंत, सेक्स\t| 48 Comments\nसर्वप्रथम या स्टार माझा तर्फे आयोजित ब्लॉग माझा या स्पर्धे मध्ये पारितोषिक मिळालेल्या सगळ्या ब्लॉगर्सचे मनापासून अभिनंदन. स्टार माझा तर्फे मराठी ब्लॉगर्सला उत्तेजन म्हणून दर वर्षी मराठी ब्लॉगच्या स्पर्धा घेतल्या जातात. या वर्षी पण या स्पर्धा घेतल्या गेल्या आणि त्याच्या … Continue reading →\nPosted in मराठी\t| Tagged मराठी ब्लॉग, स्टार माझा, स्टार माझा ब्लॉग स्पर्धा निकाल\t| 40 Comments\nगणपती दूध पितोय… टिव्हीवर सारखं दाखवत होते, मनोहर पंत पण दुधाचं भांडं हातात धरून सिद्धीविनायकाला दूध पाजताना सारखं टिव्ही वर दाखवत होते. सगळा देश पेटला होता , एका वेगळ्याच फ्रेन्झी ने. नंतर बातमी पसरली की आता प्रत्येकाच्या घरचे देवातले गणपती … Continue reading →\nकारगिल च्या युद्धामधे हौतात्म्य पत्करलेल्या योध्यां मधे कोण कोण होते खाली यादी देतोय बघा.. मिलिटरीचे अधिकारी मेजर :- १० कॅप्टन :- ८ लेफ्ट. कर्नल:- ३ लेफ्टनंट:- ७ शिपाई :- २७ सगळे मिळून अधिकारी २८, आणि शिपाई २७. एअरफोर्सचे अधिकारी स्क्वॉड्रन … Continue reading →\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nसिक्रेट मेसेज कसा पाठवायचा\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/gaatha-shastranchi-news/mouse-c96-broomhandle-pistol-1630847/", "date_download": "2018-08-18T11:13:18Z", "digest": "sha1:V5U2S2UGTWXFUUCZTTZYRXIQGNGSHRXT", "length": 15201, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mouse C96 BroomHandle Pistol | माऊझर सी ९६ ‘ब्रूमहँडल’ पिस्तूल | Loksatta", "raw_content": "\nबेशिस्त वाहनचालकांना ९१ लाखांचा दंड\nपक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा\nपुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित\nजळगावमध्ये महाजन-खडसे गटबाजीची सर्वत्र बाधा\nएमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल\nमाऊझर सी ९६ ‘ब्रूमहँडल’ पिस्तूल\nमाऊझर सी ९६ ‘ब्रूमहँडल’ पिस्तूल\nएकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस रिव्हॉल्व्हरचा बराच प्रसार झाला होता\nपॉल माऊझर यांच्या माऊझर सी ९६ ब्रूमहँडल (Mauser Construktion 96 Broom-handle) या सेमी-ऑटोमॅटिक पिस्तुलाने इतिहासात महत्त्वाचे स्थान पटकावले आहे.\nएकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस रिव्हॉल्व्हरचा बराच प्रसार झाला होता. त्यामुळे एका वेळी अनेक गोळ्या झाडण्याची क्षमता असलेल्या शस्त्रांची मागणी वाढू लागली होती. युद्धात ही बाब निर्णायक ठरत होती. त्यामुळे रायफलमध्येही सिंगल-शॉटऐवजी मल्टि-शॉट तंत्राला महत्त्व आले होते. रिव्हॉल्व्हरमध्ये पाच ते सहाच्या वर गोळ्या मावत नसत. त्यामुळे अधिक क्षमतेच्या पिस्तुलांच्या विकासाला चालना मिळाली. जर्मनीतील ह्य़ुगो बोरशार्ट (Hugo Borchardt) यांनी १८९३ साली ऑटोमॅटिक पिस्तुलाची प्राथमिक आवृत्ती बनवली होती. त्याचे पिस्तूल बोरशार्ट सी-९३ नावाने ओळखले जात होते. जर्मनीतीलच जॉर्ज लुगर यांनी बोरशार्ट यांच्या पिस्तुलात सुधारणा करून १९९८ साली लुगर पिस्तूल बाजारात आणले होते. त्याला चांगली मागणी होती.\nमाऊझर यांनी १८७८ साली झिगझ्ॉग नावाचे रिव्हॉल्व्हर बाजारात आणले होते. त्याच्या रिव्हॉल्व्हिंग चेंबरवर इंग्रजी झेड अक्षराच्या आकारात खाचा होत्या. त्यावरून त्याला झिगझ्ॉग नाव पडले. पण ते बाजारात फारसे खपले नाही. त्यानंतर माऊझर यांनी फिडेल, फ्रेडरिक आणि जोसेफ फिडरले (Fidel, Friedrich, Josef Feederle) या बंधूंच्या मदतीने १८९६ साली सी-९६ पिस्तुल बनवले. त्यात एका वेळी १० गोळ्या मावत असत. ते सेमी-ऑटोमॅटिक प्रकारचे पिस्तूल होते. माऊझर यांनी पॉट्सडॅम येथे कैसर विल्हेम दुसरे यांना सी-९६ पिस्तुलाचे प्रात्यक्षिक दाखवले होते. त्यांनाही ते आवडले. मात्र जर्मन सेनादलांसाठी त्याची निर्मिती केली गेली नाही. माऊझर सी ९६ पिस्तूल त्यावेळी काळाच्या पुढे असल्याचे मानले जाते.\nपुढे लुगर आणि ब्राऊनिंग पिस्तुलांमुळे ऑटोमॅटिक पिस्तुले स्वीकारण्याची मानसिकता बनली आणि माऊझर यांच्या सी ९६ पिस्तुलाला मागणी आली. त्याचे हँडल जमीन लोटण्यासाठी वापरायच्या झाडूसारखे होते. म्हणून हे पिस्तूल ब्रूम-हँडल नावाने अधिक गाजले. १८९६ ते १९३९ दरम्यान सी-९६च्या दहा लाख प्रती तयार झाल्या होत्या.\nब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी तरुणपणी सैन्यात सेकंड लेफ्टनंट असताना आफ्रिकेतील सुदान येथील युद्धात माऊझर सी-९६ ब्रूमहँडल पिस्तूल वापरले होते. त्याने त्यांचे प्राण वाचवल्याची आठवण ते सांगत. लॉरेन्स ऑफ अरेबियाने ते वापरले होते. रशियाच्या बोल्शेव्हिक क्रांतिकारकांमध्ये ते प्रसिद्ध होते. तसेच भारतीय स्वातंत्र्यलढय़ात ऑगस्ट १९२५ मध्ये रामप्रसाद बिस्मिल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काकोरी कटामध्ये रेल्वेतील खजिना लूटताना त्यांचा वापर केला होता. चिनी साम्यवादी जनरल झु डे यांनी नानचांग उठावात हेच पिस्तूल वापरले होते.\nपहिल्या महायुद्धादरम्यान माऊझर यांनी लुगर कंपनीचा ताबा घेतला. त्यानंतरही माऊझर कंपनीने ऑटोमॅटिक रायफल, रणगाडाविरोधी बंदूक, शिकारीच्या आणि खेळातील नेमबाजीच्या बंदुकांचे उत्पादन केले. माऊझर बंधूंपैकी विल्हेम यांचे १८८२ साली तर पॉल यांचे १९३० मध्ये निधन झाले. पण त्यांनी घालून दिलेली दर्जेदार उत्पादनांची परंपरा आजही कायम आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n पिंपरीत पित्याने दोन मुलांची हत्या करुन केली आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nIt's Official: नात्यावर शिक्कामोर्तब करत अखेर निक-प्रियांका म्हणाले....\nसहजीवनाचा पहिला टप्पा सर, थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा\nइम्रान खानच्या शपथविधीला सिद्धूंना मानाचे स्थान, घेतली लष्करप्रमुखांची गळाभेट\nमिनी एसयुव्हीसारखं डिझाईन असलेली नवीन रेनाँ क्विड वसूल करते तुमचा पै न पै\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nअंतर्गत वाहतुकीसाठी ट्रामचा पर्याय\nवाहनांना एक टोल माफ\nरेल्वेचे संगणकीय आरक्षण केंद्र पावणेतीन तास बंद राहणार\nस्वानंद देणारे शिक्षण निवडा\nवामनदादा कर्डकांना शाहिरीतून अभिवादन\nभूगावमधील हॉटेलमध्ये कोंबडय़ांच्या झुंजीवर जुगार\nपाणी पुरेना आणि म्हणे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/loksatta-vyakti-vedh-s-somanath-1622172/", "date_download": "2018-08-18T11:13:23Z", "digest": "sha1:PEW3UD3LWI2MO5HWNZVKFDHWAYNVOSOD", "length": 13810, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Vyakti Vedh S Somanath | एस. सोमनाथ | Loksatta", "raw_content": "\nबेशिस्त वाहनचालकांना ९१ लाखांचा दंड\nपक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा\nपुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित\nजळगावमध्ये महाजन-खडसे गटबाजीची सर्वत्र बाधा\nएमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल\nसहभागी वैज्ञानिकांपैकी एक म्हणजे एस.सोमनाथ.\nभारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोने गेल्या वर्षी एकाच वेळी १०४ उपग्रह सोडण्याचा विक्रम केला होता. याशिवाय चांद्रयान, मंगळ मोहिमेसह अनेक मोहिमा इस्रोने यशस्वीपणे व कमी खर्चात पार पाडल्या. अनेक व्यावसायिक उपक्रम राबवून इस्रोची आर्थिक क्षमता वाढत आहे. सरकारवरचे अवलंबित्व कमी होत आहे. इस्रोकडे चांगल्या बुद्धिमान व समर्पण वृत्तीच्या वैज्ञानिकांची कमी नाही. ज्या १०४ उपग्रह सोडण्याच्या मोहिमेचा वर उल्लेख केला आहे त्यात सहभागी वैज्ञानिकांपैकी एक म्हणजे एस.सोमनाथ. त्यांच्याकडे आता विक्रम साराभाई अवकाश केंद्राच्या संचालकपदाची धुरा देण्यात आली आहे\nसोमनाथ हे या केंद्राचे माजी सहायक संचालक असून सध्या ते लिक्विड प्रॉपल्शन सिस्टीम सेंटरचे संचालक आहेत. इस्रोपुढे जीएसएलव्ही म्हणजे भूस्थिर उपग्रह प्रक्षेपकाचे उड्डाण यशस्वी करण्याचे जे मोठे आव्हान होते ते पेलण्यात सोमनाथ यांचा मोठा वाटा आहे. डिसेंबर २०१४ मध्ये जीएसएलव्ही एमके ३ या प्रक्षेपकाचे उड्डाण यशस्वी झाले होते, त्यातही त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली.\nसोमनाथ हे मूळचे केरळचे. त्यांचे शिक्षण बेंगळूरु येथील आयआयएस्सी या संस्थेत झाले. तेथे त्यांना हवाई अभियांत्रिकीत सुवर्णपदक मिळाले होते. त्यापूर्वी त्यांनी कोलमच्या टीकेएम अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतली. अमेरिकेच्या दबावामुळे रशियाने भारताला क्रायोजेनिक इंजिने व त्याचे तंत्रज्ञान नाकारले. त्यानंतर जेव्हा देशातच क्रायोजेनिक इंजिने तयार करण्याचा संकल्प करण्यात आला त्यात सोमनाथ सहभागी होते. सध्या त्यांच्यापुढे पुढील महिन्यात होणाऱ्या दोन उड्डाणांचे आव्हान आहे. जीएसएलव्ही मार्क ३ या प्रक्षेपकाच्या आणखी यशस्वी चाचण्या घेण्याला त्यांचे प्राधान्य असणार आहे. कारण आपली चांद्रयान दोन मोहीम ही एप्रिलमध्ये होण्याची शक्यता असून त्यात जीएसएलव्ही मार्क ३ हा जास्त ताकदवान प्रक्षेपक वापरण्याची योजना आहे. यात दोनशे टनांचे निम्न क्रायोजेनिक इंजिन वापरले जाणार असून त्याच्या निर्मितीत सोमनाथ यांची कामगिरी महत्त्वाची आहे. १९८५ मध्ये इस्रोत दाखल झाल्यानंतर त्यांनी पीएसएलव्ही, जीएसएलव्ही, क्रायोजेनिक इंजिने, द्रव इंधनावर चालणारे प्रक्षेपक या अनेक प्रकल्पांत काम केले आहे. अ‍ॅस्ट्रॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अवकाश सुवर्णपदक, इस्रोचा उत्तम गुणवत्ता पुरस्कार, सामूहिक नेतृत्व पुरस्कार त्यांना मिळाला. इंडियन नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनीअरिंग, एरॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया, अ‍ॅस्ट्रॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थांचे ते फेलो आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n पिंपरीत पित्याने दोन मुलांची हत्या करुन केली आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nIt's Official: नात्यावर शिक्कामोर्तब करत अखेर निक-प्रियांका म्हणाले....\nसहजीवनाचा पहिला टप्पा सर, थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा\nइम्रान खानच्या शपथविधीला सिद्धूंना मानाचे स्थान, घेतली लष्करप्रमुखांची गळाभेट\nमिनी एसयुव्हीसारखं डिझाईन असलेली नवीन रेनाँ क्विड वसूल करते तुमचा पै न पै\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nअंतर्गत वाहतुकीसाठी ट्रामचा पर्याय\nवाहनांना एक टोल माफ\nरेल्वेचे संगणकीय आरक्षण केंद्र पावणेतीन तास बंद राहणार\nस्वानंद देणारे शिक्षण निवडा\nवामनदादा कर्डकांना शाहिरीतून अभिवादन\nभूगावमधील हॉटेलमध्ये कोंबडय़ांच्या झुंजीवर जुगार\nपाणी पुरेना आणि म्हणे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2018-08-18T10:56:09Z", "digest": "sha1:7DDAQRKZD6E32ML2GDMYS3QDZKKIBUEE", "length": 15181, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "नवी सांगवीत महात्मा फुले जयंतीनिमित्त पदयात्रा - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे…\nपिंपळेगुरवमध्ये रविवारी पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त स्नेहमेळाव्याचे आयोजन\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची…\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Chinchwad नवी सांगवीत महात्मा फुले जयंतीनिमित्त पदयात्रा\nनवी सांगवीत महात्मा फुले जयंतीनिमित्त पदयात्रा\nमहात्मा फुले जयंतीनिमित्त पिंपरी- चिंचवड शहर मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संघटनेच्या वतीने नवी सांगवीतील फेमस चौक, शिवनेरी चौक, राजमाता गार्डन येथे पदयात्रा काढण्यात आली. यावेळी स्त्री -पुरुष समानता, कविता, घोषवाक्ये तसेच स्पीकरद्वारे जनजागृती करण्यात आली.\nया पदयात्रेत लहान मुलांचाही सहभाग होता. यावेळी संस्थापक अध्यक्ष विलास कुचेकर, महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष डॉ. अभिषेक हरिदास, मुरलीधर दळवी, संगीता जोगदंड, विलास शहाणे, महाराष्ट्र अध्यक्ष सतिश लालबिगे, अँड सचिन काळे आदी उपस्थित होते.\nजात, धर्म, लिंग, पंथ असे भेदभाव कमी करून सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे. सामाजिक न्यायबुद्धीने सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे, शिक्षण हाच परिवर्तनाचा मार्ग आहे, शिक्षणाचा अधिकार हा मानवी अधिकार आहे, असे प्रतिपादन पिंपरी – चिंचवड शहर अध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी केले.\nPrevious articleगुंड अजय काळभोर टोळीतील एकाला दोन गावठी पिस्तूलींसह अटक\nNext articleउपोषणाआधीच्या सुचनांना हरताळ; भाजप आमदारांचा सँडविच, बर्फी, वेफर्सवर ताव\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे पोस्टर\nपिंपळेगुरवमध्ये रविवारी पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त स्नेहमेळाव्याचे आयोजन\nराष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nऔरंगाबाद वाळूज एमआयडीसी तोडफोडप्रकरणी ३७ जणांना अटक; तर पंचनाम्यात तब्बल ६०...\nहॅकरने असे केले पुण्यातील कॉसमॉस बँकेतून ९४ कोटी गायब; व्हिसा कंपनीमुळे...\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nवाजपेयींच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनाला दिग्गजांची रीघ; फडणवीस यांच्याकडून पार्थिवाचे अत्यंदर्शन\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nचिंचवड रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलिसांनी वाचवले वृध्दाचे प्राण\nचिंचवडमध्ये संगणक अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/qna/135", "date_download": "2018-08-18T09:56:26Z", "digest": "sha1:6F7BXN4W6REKSZP4P5QGRTE32MMGWZAT", "length": 6308, "nlines": 101, "source_domain": "www.transliteral.org", "title": "शंखनादाविषयी कांही माहिती पाहिजे. - TransLiteral - Questions and Answers", "raw_content": "\nशंखनादाविषयी कांही माहिती पाहिजे.\nखरेतर शंखनादचा विपरित अर्थ असा की, उलटा हात तोंडावर ठेउन बोंब मारणे, आणि हे अशुभ समजतात. महादेवाच्या मंदिरात शंखनाद करतात. दत्तसंप्रदायाशी संबंधित नवनाथ, साधुदेखील शंखनाद करतात. शंखनाद करणे ही एक अतिशय पवित्र घटना आहे, त्यामुळे वातावरणात चैतन्य निर्माण होते. घरात शंखनाद करू नये असे म्हणतात पण त्याला कोणताही शास्त्राधार नाही, पण घरात फक्त देवघरातच शंखनाद करावा. पूर्वीच्या काळी महाभारतात युद्ध सुरू करण्यापूर्वी शंखनाद करीत, आणि युद्ध चालू होत असे, त्यामुळे कदाचित कलहाला आमंत्रण मिळते म्हणून घरात शंखनाद करीत नसावेत. बंगालमध्ये लग्नात शंखनाद करतात, आणि ते पवित्र समजतात.\nयजुर्वेदात सांगितले आहे की,\nयस्तु शंखध्वनिं कुर्यात्पूजाकाले विशेषतः, वियुक्तः सर्वपापेन विष्णुनां सह मोदते \nअर्थात जी व्यक्ति पूजेसमयी शंखनाद करेल त्याची सर्व पापे नष्ट होऊन त्याला भगवान विष्णुसोबत आनंद प्राप्त होतो.\nघरात दक्षिणावर्ती शंख असावा.\nकापूर जाळण्यामागची संकल्पना काय कांही फायदे आहेत काय\n नजिकचा कुंभमेळा कोठे आहे \nश्रावण महिन्यांत महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक कां करावा\nश्रीयंत्र स्थापना व मुहूर्त याबद्दल माहिती द्यावी.\nमृतव्यक्तीच्या तेराव्याच्या जेवणात कोणकोणते पदार्थ करतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/gift-labour-leads-makeover-water-stream-43878", "date_download": "2018-08-18T10:55:08Z", "digest": "sha1:LCMIXFCN3NTAYC3BSS32JPXNSAWINBXA", "length": 18738, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "gift of labour leads makeover of water stream श्रमदानाने पालटले कोरोची ओढ्याचे रूप | eSakal", "raw_content": "\nश्रमदानाने पालटले कोरोची ओढ्याचे रूप\nसोमवार, 8 मे 2017\nइचलकरंजी : वीर सेवा दल आणि सकाळ तनिष्कातर्फे आज कोरोची (ता. हातकणंगले) येथील ओढ्याची स्वच्छता करण्यात आली. गावालगतच असलेल्या आणि निसर्गरम्य पार्श्‍वभूमी असलेल्या या ओढ्याची अवस्था दयनीय झाली होती. मात्र श्रमदानाने या ओढ्याचे रूप आज पूर्णपणे पालटून गेले.\nइचलकरंजी : वीर सेवा दल आणि सकाळ तनिष्कातर्फे आज कोरोची (ता. हातकणंगले) येथील ओढ्याची स्वच्छता करण्यात आली. गावालगतच असलेल्या आणि निसर्गरम्य पार्श्‍वभूमी असलेल्या या ओढ्याची अवस्था दयनीय झाली होती. मात्र श्रमदानाने या ओढ्याचे रूप आज पूर्णपणे पालटून गेले.\nओढ्याच्या सुरवातीच्या भागाची आज पूर्णपणे स्वच्छता झाली. यानंतर टप्याटप्याने ओढ्यालगत असलेल्या स्मशानभूमी भोवती वृक्षारोपण आणि ठिकठिकाणी बंधारे घालून पाणी अडविण्यात येणार आहे. यामुळे कोरोची आणि परिसरातील शेतकऱ्यांना या ओढ्यातील पाण्याचा फायदा होणार आहे.\nवीर सेवा दल ही सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी दक्षिण भारत जैन सभेच्या अंतर्गत चालणारी संघटना आहे. या संघटनेतर्फे विविध सामाजिक आणि राष्ट्रीय कामे केली जातात. गेल्यावर्षी या संघटनेतर्फे अब्दुललाट आणि चोकाक येथील तळ्याचे काम करण्यात आले होते. या वर्षी पहिल्या टप्प्यात कोरोची येथील ओढा साफसफाई व रूंदीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोरोची येथील जिल्हा परिषद माजी सदस्य सौ. प्रेमला पाटील यांच्या नेतृत्वाखालील स्वामिनी तनिष्का गट सक्रिय आहे. या गटाच्यावतीनेही यापूर्वीच या ओढ्याच्या कामाबाबत सर्व्हे झाला होता. त्यामुळे दोन्ही संघटनेच्या वतीने आजही मोहीम राबविण्यात आली.\nउद्‌घाटनाचा कोणताही औपचारिक कार्यक्रम न घेता पहाटे साडेसहापासूनच युवक आणि तनिष्का सदस्यांनी स्वच्छता मोहिमेस प्रारंभ केला. गावालगतच ओढ्याजवळ असलेल्या स्मशानभूमीची आणि परिसराची दयनीय अवस्था झाली होती. अत्यसंस्कारानंतर टाकलेले साहित्य, गावकऱ्यांनी नको असलेले टाकलेले विविध वस्तू आणि झाडे झुडपे यामुळे हा परिसर अत्यंत गलिच्छ झाला होता. सुरवातीला याच परिसराची स्वच्छता करण्यात आली. काही तासातच श्रमदानाने संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर आलेल्या जेसीबीच्या सहाय्याने ओढ्याच्या पात्राची स्वच्छता सुरू झाली. या वेळी जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी संजय सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती. या मोहिमेला कोरोची ग्रामपंचायतीनेही सहकार्य केले. ग्रामपंचायतीने पाठविलेल्या ट्रॅक्‍टर ट्रॉलीद्वारे संपूर्ण कचरा ओढ्यातून हलविण्यात आला. युवक, महिला आणि बालचमूंच्या उत्साही कामाने या ओढ्याच्या सुरवातीचा भाग आज चकचकीत बनला. या ठिकाणी वृक्षारोपणाबरोबरच परिसराचे सौंदर्य वाढविण्यासाठी विविध कामे करण्याचा निर्णय सकाळ तनिष्का गट आणि वीर सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. \"सकाळ'चे बातमीदार संजय खूळ, वितरण विभागाचे मिलिंद फुले यांनी स्वागत केले.\nया मोहिमेत भाग घेतलेले सहयोगी ः\nस्वामिनी तनिष्का गट- सीमा पाटील, गीता साळुंखे, पुष्पमाला मोरे, प्रेमला पाटील, वैशाली दुर्गाडे, पूनम पाटील, सुवर्णा नागावे, मनीषा पाटील, संगीता पाटील\nअजित पाटील वीर सेवा दल जिल्हाप्रमुख, विजय बरगाले जिल्हा सचिव, स्वप्नील उपाध्ये, सौरभ पाटील, वीर सेवा दल सदस्य ः शीतल पाटील, विपुल पाटील, बाहुबली उपाध्ये, जितेंद्र चौगुले, सुदर्शन चौगुले, विरेंद्र कुरूंदवाडे, उदय बरगाले, भरत पाटील, बाहुबली पाटील, श्रेणीक पाटील, सौरभ उपाध्ये, सूरज पाटील, अमोल पाटील, अभय पाटील, संकेत पाटील, सौरभ भमाणे, प्रणव नाईक, अक्षय पाटील, नीलेश चावरे, गोमटेश मगदूम, अमोल उपाध्ये, विजय सुतार, अनिल गडकरी, जलदकुमार पाटील, विजय गिरमल, अभयकुमार पाटील, सुदर्शन बुद्रुक.\nपार्श्‍व युवा मंचचे सदस्य ः सौरभ पाटील, दीपक पाटील, रमेश पाटील, विशाल पाटील, सूरज पाटील, सुमित पाटील, प्रणव जाधव, अशोक पाटील, राकेश कुरूंदवाडे, विलास दुरूगडे, अमोल उपाध्ये, सचिन पाटील, दीपक कोले, संतोष मगदूम. जयभद्र पाठशाळा ः पार्श्‍व पाटील, अभिषेक प्रधाने, अभिजित बरगाले, अविष्कार बरगाले, अनुष्का बरगाले, अनिकेत बरगाले, संदीप कुरुंदवाडे, सुजल कुरूंदवाडे, आदित्य प्रधाने, विनोद कुडचे, अविनाश माणगावे, अक्षय अंकलगे. याचबरोबर वीर सेवा दलाच्या हुपरी, कबनूर, किणी, रुई, चोकाक, कुंभोज, शिरदवाड, इचलकरंजी, कुरुंदवाड या शाखेतील स्वयंसेवकांचा या मोहिमेत सहभाग राहिला.\nयाचवेळी तनिष्काच्या महिलांनी स्मशानभूमी आणि त्या परिसराची स्वच्छता केली. सर्व दगड एकत्र करून त्याचा बंधाराही नजीकच्या ठिकाणी घालण्यात आला. स्मशानभूमीमध्ये येऊन स्वच्छता मोहीम करण्याची महिलांची ही पहिलीच वेळ होती. अतिशय उत्साहाने सकाळ तनिष्का गटाच्या सदस्यांनी हे काम केले. तनिष्का गटाच्या अध्यक्षा प्रेमला पाटील यांनी नाष्टा व चहाची सोय केली होती.\nपिंपरी - दोन मुलांना मारून वडिलांची आत्महत्या\nपिंपरी (पुणे) - दोन मुलांना मारून वडिलांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना शनिवारी दुपारी ताथवडे येथे घडली. शुभम बर्मन (वय १०) रूपम वर्मा (वय...\nMaratha Kranti Morcha : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री आंदोलन\nपुणे : मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे सोमवारपासून (ता.20) मराठा आरक्षणासाठी आणि विविध मागण्यांसाठी पुणे विभागीय आयुक्त...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nसंग्रामपूर : वाण धरण ६५ टक्के भरले\nसंग्रामपूर : सातपुडा पर्वतामधील तीन जिल्ह्यांसाठी जलसंजीवनी ठरलेले वाण धरण 65 टक्के भरले आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%A8-12-%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-18T10:54:17Z", "digest": "sha1:TB3UWVTPRQIGJQHLATR7PH45TYI22Z3L", "length": 7745, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बांगलादेशात दरड कोसळून 12 रोहिंग्यांचा मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबांगलादेशात दरड कोसळून 12 रोहिंग्यांचा मृत्यू\nढाका: बांगलादेशात आश्रयासाठी आलेल्या रोहिंग्यांचे प्रश्न अजूनही संपलेले नाहीत. बांगलादेशातील कॉक्स बझार या जिल्ह्यात 10 लाखांच्या आसपास रोहिंग्या छावणीमध्ये राहात आहेत. मॉन्सूननंतर या छावणीतील रोहिंग्यांच्या त्रासामध्ये अधिकच भर पडली आहे. दरड कोसळल्यामुळे 12 रोहिंग्यांचे प्राण गेले आहेत.\nसोमवारी मातीखाली गाडल्या गेल्यामुळे एका लहान मुलाचे कुतुपालोंग छावणीत प्राण गेले होते. रोहिंग्या छावणी डोंगराळ प्रदेशाला लागून असल्यामुळे छावणीतील 2 लाख लोकांना दरडीखाली येण्याचा थेट धोका आहे. तसेच मॉन्सूनमुळेही त्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. आश्रय छावणी बांधण्यासाठी येथील टेकड्यांवरील झाडांची तोड करण्यात आली होती त्यामुळे तेथील उतारावरील जमिनीचा आधारच नाहिसा झाला आहे. मॉन्सून येण्यापुर्वी 29 हजार रोहिंग्यांचे स्थलांतर करण्यात आले होते. दरडीमुळे सध्या 30 घरांचे नुकसान झाले आहे.\nया परिसरामध्ये आतापर्यंतच 2.5 मी इतका पाऊस पडला आहे. इंग्लंडमध्ये वर्षभरात जितका पाऊस पडतो त्यापेक्षा हा तिप्पट पाऊस आहे. गेल्या वर्षी मॉन्सूनमुळे दरड कोसळून कॉक्स बझार आणि चितगांवच्या डोंगराळ प्रदेशात 70 लोकांचे प्राण गेले होते. दरडींबरोबर पूराचा धोकाही असल्यामुळे रोहिंग्यांच्या छावण्या अधिकच संकटात सापडल्या आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराज ठाकरेंनी व्यंगचित्रातून ‘असा’ साधला संभाजी भिडेंवर निशाणा\nNext articleदुबईतील भारतीय शेफला डच्चू\nसंयुक्त राष्ट्र संघाचे माजी सचीव कोफी अन्नान यांचे निधन\nपाक व्याप्त कश्मीरच्या राष्ट्रपतींच्या शेजारी बसले सिध्दू, होतोय मोठा वाद\nइस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांची पुन्हा चौकशी\nचीन करु शकतो अमेरिकी तळांवर हवाई हल्ला\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान यांची निवड…\nसदिच्छा दूत म्हणून पाकिस्तानला भेट…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A6%E0%A5%AB_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-08-18T09:57:41Z", "digest": "sha1:5TMX7FDWER45RBUUPWDAV7OUHIEBZE2N", "length": 6982, "nlines": 261, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९०५ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९०५ मधील जन्म\n\"इ.स. १९०५ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ५० पैकी खालील ५० पाने या वर्गात आहेत.\nॲस्ट्रिड (बेल्जियमची स्वीडिश राणी)\nइ.स.च्या १९०० च्या दशकातील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ मार्च २०१५ रोजी २०:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/urjit-patel-comment-on-union-budget-2018-1628231/", "date_download": "2018-08-18T11:11:13Z", "digest": "sha1:L4A4XKWPBOCFINMSNVF65G755SSAPLOV", "length": 16670, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Urjit Patel comment on Union Budget 2018 | अर्थसंकल्प महागाईवाढीला पूरक | Loksatta", "raw_content": "\nबेशिस्त वाहनचालकांना ९१ लाखांचा दंड\nपक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा\nपुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित\nजळगावमध्ये महाजन-खडसे गटबाजीची सर्वत्र बाधा\nएमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल\nरिझव्‍‌र्ह बँकेचा सावधगिरीचा इशारा\nमोदी सरकारला रिझव्‍‌र्ह बँकेचा सावधगिरीचा इशारा, व्याज दर जैसे थे\nरिझव्‍‌र्ह बँकेने अपेक्षेप्रमाणे व्याजाच्या दरात कोणतेही बदल न करण्याचा निर्णय बुधवारी आटोपलेल्या दोन दिवसांच्या पतधोरण निश्चिती समितीच्या द्विमासिक बैठकीअंती घेतला. खनिज तेलाच्या आयात किमतीतील वाढ, भरीला केंद्र सरकारने खर्चाबाबतसैल सोडलेला हात हे महागाईत भर घालणारे ठरेल आणि वित्तीय तुटीत वाढ करणारे ठरेल, असा मध्यवर्ती बँकेने चिंताजनक सूर लावलेलाही दिसून आला.\nसहा सदस्य असलेल्या पतधोरण निश्चिती समितीतील गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्यासह पाच सदस्यांनी रेपो रेट सध्याच्याच ६ टक्क्य़ांच्या पातळीवर कायम ठेवण्याच्या बाजूने तर एका सदस्याने (मायकेल पात्रा) पाव टक्क्य़ांच्या वाढीच्या बाजूने कौल दिला. २०१७-१८ सालातील या सहाव्या द्विमासिक आढावा बैठकीत रिझव्‍‌र्ह बँकेने घेतलेला ‘तटस्थ’ पवित्रा हा विद्यमान मोदी सरकारसाठी सावधगिरीचा इशारा तर गुंतवणूकदार वर्गासाठी अनिष्टसूचक मानला जात आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने यापूर्वी ऑगस्ट २०१७ मध्ये रेपो दरात पाव टक्क्य़ांची कपात केली आहे.\nरिझव्‍‌र्ह बँकेने तात्पुरत्या स्वरूपात महागाई भडकण्याचा धोका व्यक्त केला असून, तिमाहीसाठी ५.१ टक्के हे महागाईचे वाढीव सुधारित लक्ष्य ठेवले आहे. एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षांत पहिल्या सहामाहीत महागाईत आणखी भर पडून ती ५.१ ते ५.६ टक्क्य़ांच्या घरात राहण्याचा रिझव्‍‌र्ह बँकेचा कयास आहे. सरलेल्या डिसेंबरमध्येच किरकोळ किमतीवर आधारित महागाई दर ५.२१ टक्के अशा १७ महिन्यांतील उच्चांकी स्तराला पोहोचल्याचे आढळून आले आहे.\nयंदाच्या अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेतील मागणीला चालना देणाऱ्या तरतुदी असल्या तरी, खासगी गुंतवणुकीच्या अभावी सरकारी खर्चात वाढीतूनच हे साध्य केले जाणे, महागाई वाढ आणि वित्तीय शिस्तीत बिघाडाच्या दृष्टीनेही धोक्याचे असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले आहे.\nरिझव्‍‌र्ह बँकेने चालू २०१७-१८ वर्षांसाठी विकासदर पूर्वअंदाजित ६.७ टक्क्य़ांच्या पातळीवरून आणखी खाली आणून ६.६ टक्के राहण्याचे भाकीत केले आहे. त्यानंतरच्या वर्षांत मात्र तो ७.२ टक्क्य़ांपर्यंत वाढण्याचा तिचा अंदाज आहे.\nयेत्या काही महिन्यांत महागाईविषयक बदलत जाणाऱ्या स्थितीबाबत दक्षतेची गरज आहे. अर्थसंकल्पात दर्शविल्याप्रमाणे वित्तीय शिस्तीच्या आघाडीवरील घसरण आणि सरकारच्या कर्जभारात वाढीच्या शक्यतेने चलनवाढीसंबंधीच्या दृष्टिकोनाला आणखीच सावध बनविले आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याच्या अर्थसंकल्पातील घोषणेतून, अन्नधान्याच्या किमती वाढून त्या परिणामी चलनवाढीला खतपाणी घातली जाईल, असा कयास करणे मात्र घाईचे ठरेल, असे मात्र गव्हर्नर पटेल यांनी स्पष्ट केले.\nरिझव्‍‌र्ह बँकेने महागाई दराबाबत निर्धारित केलेल्या ४ टक्क्य़ांच्या लक्ष्याला अनुकूल अशा वित्तीय शिस्तीचा मार्ग सरकारने २०१४ सालापासून अनुसरला आहे. मात्र आता सरकारच्या या मार्गावरून भरकटण्याने आपले काम आव्हानात्मक बनले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने मध्यम कालावधीत महागाई दर ४ टक्क्य़ांच्या मर्यादेत राहील हे लक्ष्य, २०१९ मध्ये सरकारकडून वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ३ टक्के पातळीवर आणली जाईल या गृहीतकावर बेतलेले होते. – गव्हर्नर ऊर्जित पटेल (पत्रकारांशी बोलताना)\nपतधोरणाची ठळक वैशिष्टय़े :\nरेपो दर : ६ टक्के, रिव्हर्स रेपो : ५.७५ टक्के पातळीवर स्थिर\nविकास दराचा अंदाज खालावला २०१७-१८ मध्ये : ६.६ टक्के, २०१८-१९ मध्ये ७.२ टक्के\n‘बेस रेट’ची १ एप्रिल २०१८ पासून ‘एमसीएलआर’शी सांगड\nसुरळीत वस्तू व सेवा करामुळे अर्थव्यवस्था रुळावर येणार\nसरकारी बँकांच्या पुनर्भाडवलामुळे कर्जपुरवठा वाढण्यास वाव\nव्याजदर बदल निर्णयासाठी पुढील बैठक ४ व ५ एप्रिल रोजी\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n पिंपरीत पित्याने दोन मुलांची हत्या करुन केली आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nIt's Official: नात्यावर शिक्कामोर्तब करत अखेर निक-प्रियांका म्हणाले....\nसहजीवनाचा पहिला टप्पा सर, थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा\nइम्रान खानच्या शपथविधीला सिद्धूंना मानाचे स्थान, घेतली लष्करप्रमुखांची गळाभेट\nमिनी एसयुव्हीसारखं डिझाईन असलेली नवीन रेनाँ क्विड वसूल करते तुमचा पै न पै\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nअंतर्गत वाहतुकीसाठी ट्रामचा पर्याय\nवाहनांना एक टोल माफ\nरेल्वेचे संगणकीय आरक्षण केंद्र पावणेतीन तास बंद राहणार\nस्वानंद देणारे शिक्षण निवडा\nवामनदादा कर्डकांना शाहिरीतून अभिवादन\nभूगावमधील हॉटेलमध्ये कोंबडय़ांच्या झुंजीवर जुगार\nपाणी पुरेना आणि म्हणे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE/", "date_download": "2018-08-18T10:55:22Z", "digest": "sha1:CHKEVJJCDM3CADJZTTS2O6BJQOKY7VNP", "length": 15151, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "‘मी ठरवले तर एका मिनिटात मुख्यमंत्री होऊ शकते, पण माझी इच्छा नाही’- हेमा मालिनी - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे…\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची…\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Desh ‘मी ठरवले तर एका मिनिटात मुख्यमंत्री होऊ शकते, पण माझी इच्छा नाही’-...\n‘मी ठरवले तर एका मिनिटात मुख्यमंत्री होऊ शकते, पण माझी इच्छा नाही’- हेमा मालिनी\nजयपूर, दि. २७(पीसीबी) – ‘मी ठरवले तर एका मिनिटात मुख्यमंत्री होऊ शकते, पण माझी तशी इच्छा नाही,’ असे वक्तव्य भाजपा खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनी केले आहे. मुख्यमंत्री बनल्यास माझ्यावर अनेक बंधने येतील, त्यामुळे आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा नाही, असे हेमा मालिनींनी म्हटले आहे.\nउत्तर प्रदेशातील मथुरा मतदारसंघातील हेमा मालिनी या भाजप खासदार आहेत. ‘तुम्हाला संधी मिळाल्यास मुख्यमंत्री व्हायला आवडेल का’ असा प्रश्न त्यांना राजस्थानमध्ये विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी हे उत्तर दिले आहे.\n‘अभिनय क्षेत्रातील कामामुळेच मला आजही ओळखले जाते आणि मी खासदार म्हणून निवडून येण्यातही याच प्रसिद्धीचा मोठा वाटा आहे,’ असे हेमा मालिनी यांनी म्हटले.\nPrevious articleनवी मुंबईतील बंद दरम्यान जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू\nNext articleआळंदीतील इंद्रायणी नदीत आंघोळीसाठी गेलेला वृध्द वारकरी वाहून गेला; शोध कार्य सुरु\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nवाजपेयींच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनाला दिग्गजांची रीघ; फडणवीस यांच्याकडून पार्थिवाचे अत्यंदर्शन\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nमुंबईत कंत्राटदाराला मारहाण केल्याप्रकरणी मनसेचे नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nअटलबिहारी वाजपेयी कवी कुसुमाग्रजांचे निस्सीम चाहते\nदलितेतर लोकांनी आरक्षित जागांवर ‘नोटा’चा वापर करावा – भाजपा आमदार\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n…तर तेलंगण राष्ट्र समिती भाजपला पाठिंबा देईल – के. चंद्रशेखर राव\nउत्तर प्रदेश मध्ये मदरशांत मुस्लिम पेहरावावर बंदी; मुले आणि मौलवी शर्ट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://savarkar.org/mr/hindusastra.html", "date_download": "2018-08-18T09:57:08Z", "digest": "sha1:ML3UNI3NYBFSRRRLA75EKVKRYXXWEI5G", "length": 1648, "nlines": 7, "source_domain": "savarkar.org", "title": " राष्ट्र, हिंदुराष्ट्र", "raw_content": "\n'राष्ट्र, हिंदुराष्ट्र ' या विषयावरील सावरकरांचे निवडक विचार त्यांच्याच शब्दांत संदर्भासहित येथे दिलेले आहेत.जगातील मानव एक व्हावे ही सदिच्छा असली तरीजगातील मजुरांनी एक व्हावे ही सदिच्छा आहे. जगातील मानवांनी एक होऊन त्यांचे एक मानवी राष्ट्र व्हावे असे आम्हांसही वाटते. आमचा वेदान्त तर याही पुढे जाऊन दगड नि मनुष्य हे सारखेच असल्याचे सांगतो. पण आपण परिस्थितीनुरुप व्यवहार केला पाहिजे. - (१९४३ अ.हिं.ल.प.पृ. २०१) राष्ट्रवाद कालबाह्य नाही राष्ट्रवाद पाचशे वर्षे तरी जिवंत राहणार आहे. त्यानंतर काय होईल ते ..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://swarjoshi.blogspot.com/2009/06/blog-post.html", "date_download": "2018-08-18T10:03:57Z", "digest": "sha1:S4AI6UQ2JHUHMNQ74O7YBCSCYSPHD2W4", "length": 6345, "nlines": 114, "source_domain": "swarjoshi.blogspot.com", "title": "yogesh joshi: शरीरावरील तिळ आणि तुमचे भाग्य", "raw_content": "\nसोमवार, 15 जून 2009\nशरीरावरील तिळ आणि तुमचे भाग्य\nशरीरावरील तिळ आणि तुमचे भाग्य\nशरीर वर तिळ -----त्याचे फळ\nउजव्या डोळ्यावर ----स्त्रीशी प्रेम\nडव्या गालावर------खर्च वाढत जाइल\nओठांवर----------विषय-वासना यात गुंतुन राहील\nउजव्या छाती वर-----स्त्रीशी प्रेम राहील\nडव्या छाती वर------स्त्रीशी भांडणे होतील\nदोन्हीं छातीच्या मध्ये----जीवन सुखी रहील\nडव्या तळव्यावर------खूप खर्च करेल\nउजव्या हातच्या पाठी--धनवान होइल\nडव्या हाताच्या पाठी---कमी खर्च करा\nडव्या पायावर ---खर्च अधिक होइल\nप्रस्तुतकर्ता yogesh joshi पर 2:55 am\nबेनामी 27 अक्तूबर 2013 को 12:23 am\nतुला खूप काम वासना आहे\nबेनामी 15 जुलाई 2011 को 1:54 am\nबेनामी 27 अक्तूबर 2013 को 12:24 am\nमाझ्या उजव्या पायावर तीळ आहे मधोमध आणि डाव्या पायाच्या अंगठ्यावर आहे तिळतील\nउजव्या गालावर आणी डाव्या गालावरही तीळ आहे\nमनगटाचा मध्यभाग आणी तळ हतावर मुधोमध आहे तीळ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nप्रभावी स्तोत्र व मंत्र\nशरीरावरील तिळ आणि तुमचे भाग्य\nसमाज कार्य हा काही धंदा नाही की राजकारणात जाण्याची शिडी नाही.ज्या समाजात आपण राहातो त्या समजाचे आपण काही देणे लागतो याचे भान ठेऊन आवडीने समाज कार्य करत आहे.\nमेरा पूरा प्रोफ़ाइल देखें\nऑसम इंक. थीम. molotovcoketail के थीम चित्र. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://shatadapremkarave.blogspot.com/2011/03/blog-post_9773.html", "date_download": "2018-08-18T10:49:14Z", "digest": "sha1:VCANHTMT5PBSR3TY72EP6X2WHJAQWSF2", "length": 2915, "nlines": 68, "source_domain": "shatadapremkarave.blogspot.com", "title": "शतदा प्रेम करावे: वस्त्रहरण ......", "raw_content": "\nनमस्कार मित्रानो. मी अनिल बिहाणी . मझ्याबाबातीत सांगण्यासारखे विशेष काहिच नाहि.मी एक् सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य मुलगा आहे.पण प्रत्येक समान्यात कुठे तरि असामन्यत्व द्डलेलं असतं.माझ्यातल्या या असामान्यत्वाचा शोध् घेणे सद्या सुरु आहे.\nते निशब्द शांत सारे\nहा एकटा आकांत करतो\nखालच्या मानेने निघतात .\nते भिष्म द्रोण सारे\nजय हो तेरी गोविंदा ......\nक्षण जे उरले काही............\nसांज जराशी ढळली .......\nही वाट दूर जाते .......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A4%B5-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%89/", "date_download": "2018-08-18T10:53:15Z", "digest": "sha1:Q4WU6M623Y7MPLHBGIUKFITUBWMRDLCS", "length": 5739, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "केडगाव, बोरीपार्धीताला डॉ. बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकेडगाव, बोरीपार्धीताला डॉ. बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन\nकेडगाव- येथील दौंड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ आणि ग्रामपंचायत बोरीपार्धी या ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती साजरी करण्यात आली. खरेदी -विक्री संघ या ठिकाणी संघाचे संचालक संतोष शेळके यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी केडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजेंद्र गायकवाड, बापू कांबळे, रमेश बेळगल, नाना कोकरे, भगवान शेळके आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, ग्रामपंचायत बोरीपार्धी या ठिकाणी उपसरपंच सोमनाथ गडदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच जयदीप सोडनवर, दत्तात्रय गडदे, ज्ञानदेव गायकवाड, गणेश मदने, सतीश टेंगल,े अंबादास फुले आदी उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसिरीयातील तणावामुळे क्रुड आणखी महागण्याची शक्‍यता\nNext articleराष्ट्रकुल स्पर्धेची सांगता : ‘चक दे इंडिया’ म्हणत भारतीयांची गोल्डन कामगिरी (फोटो फिचर)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A3-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-18T10:53:55Z", "digest": "sha1:VN3QCOHNFMGGIYAFVLSRU7P4BQFLTQV6", "length": 8986, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाटण तालुक्‍यात वळीवाचा पाऊस | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाटण तालुक्‍यात वळीवाचा पाऊस\nकाळगावात पावसाची दमदार हजेरी\nकाळगाव व परिसरात सोमवारी पावसाने दमदार हजेरी लावली. दुपारपासून पावसाने दमदार हजेरीस प्रारंभ केला. या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनामुळे शेतकरी सुखावला आहे. वाऱ्यासह पडलेल्या जोरदार पावसामुळे शिवारात झाडे उन्मळून पडले. तर, काही ठिकाणी इमारतीवरच्या प्लॅस्टिकच्या पाण्याच्या टाक्‍या कोसळल्या.\nआंबा पीक व वीट भट्टींचे लाखोंचे नुकसान\nकराड-पाटण मार्गावर एकेरी वाहतूक\nकराड – पाटण तालुक्‍यात पाटण शहरासह कोयना, नवारस्ता, मल्हारपेठ, चाफळ, मणदुरे, मोरगिरी परिसराला सोमवारी दुपारी सुमारे दोन तास वळीवाच्या व गारांच्या पाऊस झाला. तसेच कराड तालुक्‍यात मसूर विभागात पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसाने आंबा पिकांसह वीट भट्टीचे मोठे नुकसान झाले.\nसोमवार हा पाटणचा आठवडा बाजारचा दिवस असल्याने अचानकपणे वादळी वाऱ्यासह सुरु झालेल्या जोरदार पावसाने बाजारकरूंची अक्षरशः दैनाच उडाली. वाऱ्यामुळे अनेक छोट्या व्यापाऱ्यांच्या दुकानाची पाले उडून गेल्याने त्यांचे नुकसान झाले. पाटण तालुक्‍यात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उष्णता वाढली होती. उन्हाच्या तीव्रतेमुळे अंगाची लाही लाही होत होती. गेल्या दोन दिवसांपासून तर दिवसभर आकाश ढगाळलेले राहत आहे. त्यामुळे नागरिक प्रचंड उकाड्याने हैराण झाले असतानाच सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. गारांच्या वर्षावाने या पावसाला सुरवात झाल्याने बालगोपाळांसह नागरिकांनी ही गारांचा आनंद घेतला. अचानकपणे सुरु झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.\nपावसामुळे कराड पाटण रस्त्यावर एकेरी वाहतूक\nवादळी वाऱ्यासह सुरु झालेल्या या पावसामुळे कराड-पाटण रस्त्यावरील अनेक झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाल्याने या रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहतूकीची कोंडी निर्माण झाली होती. अडुळ, मल्हारपेठ, नवारस्ता, नाडे या विभागातसुद्धा अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक सुरु होती.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleखडकवासलाच्या पुनर्जीवनाचे काम सुरू\nNext articleयंदा ७.३ टक्क्यांनी वाढणार भारताचा विकासदर – वर्ल्ड बँक\nराजवाडा चौपाटीवरील फ्लेक्‍स बोर्डमुळे झाडं सोसतायत मरणयातना\nरेल्वे अपघात एकाचा मृत्यू, घातपाताचा संशय\nजिल्ह्यात दूध संकलनात वाढ आंदोलनाची धार झाली कमी\nहुतात्मा स्मारके प्रेरणास्थळ बनावीत\nजिल्ह्यात कमी निधीमध्ये अधिक सिंचनाचे काम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://shatadapremkarave.blogspot.com/2008/03/blog-post_11.html", "date_download": "2018-08-18T10:49:24Z", "digest": "sha1:3K443CJIVUL7W2I3E2R4ENCHR5GG3CCJ", "length": 2831, "nlines": 59, "source_domain": "shatadapremkarave.blogspot.com", "title": "शतदा प्रेम करावे: सदीच्छा", "raw_content": "\nनमस्कार मित्रानो. मी अनिल बिहाणी . मझ्याबाबातीत सांगण्यासारखे विशेष काहिच नाहि.मी एक् सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य मुलगा आहे.पण प्रत्येक समान्यात कुठे तरि असामन्यत्व द्डलेलं असतं.माझ्यातल्या या असामान्यत्वाचा शोध् घेणे सद्या सुरु आहे.\nकधीतरी येतात आयुश्यात असे काही क्षण\nअन् लोटला जातो मी खोल गर्तेत\nशोधू लागतो स्वःताच स्वःताचे अस्तीत्व\nअन् अडखळूनही पडतो काहीवेळा\nकाहीच हाती लागत नाही\nअन् कंटाळून परतावे म्हटले तरी\nपरतीचा मार्ग दिसत नाही.\nउजळून टाकीत सारा आसमंत\nगवसून देतात माझ्यतले मीपण\nअन् दाखवतातही परतीचा मार्ग\nपुन्हा नव्या उमेदीने जगण्यासाठी\nजय हो तेरी गोविंदा ......\nही वाट दूर जाते .......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%AE.html", "date_download": "2018-08-18T11:10:05Z", "digest": "sha1:5UD7PF7ZBPLVKSQPO7XXK6L7LL3ITFKQ", "length": 23300, "nlines": 293, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | स्वच्छ भारत अभियानाची दमदार सुरुवात", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » स्वच्छ भारत अभियानाची दमदार सुरुवात\nस्वच्छ भारत अभियानाची दमदार सुरुवात\n=‘वॉटर एड’चा अहवाल, लोकांचा दृष्टिकोन बदलविण्यासाठी जादा निधीची गरज=\nकोची, [२२ नोव्हेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात खरोखरच दमदार झाली आहे. पहिल्याच वर्षात ८० लाख शौचालये बांधण्यात आली. हे अभियान पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी नागरिकांच्या विचारसरणीत व्यापक बदल करणे आणि त्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्याची गरज आहे, असे मत ‘वॉटर एड’ या जागतिक संघटनेने आपल्या अहवालात नमूद केले.\nकाही भागांमध्ये सुमार बांधकाम आणि नागरिकांचा जुनाच दृष्टिकोन यामुळे पहिल्या वर्षात जितक्या शौचालयांच्या बांधणीची अपेक्षा होती, ती पूर्ण होऊ शकली नसली, तरी अवघ्या एकाच वर्षात ८० लाख शौचालयांचे उद्दिष्ट गाठणे हेदेखील तितकेच उल्लेखनीय आहे. आमच्या मते, या अभियानाची सुरुवात खरोखरच दमदार झाली आहे, असे पिण्याचे स्वच्छ पाणी, पोषक हवामान, साफसफाई यासारख्या पायाभूत सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणार्‍या या जागतिक संस्थेने म्हटले आहे. सोबतच, या संस्थेने शौचालयांच्या बांधकामांचा दर्जा आणखी सुधारण्याची गरज असल्याचेही स्पष्ट केले.\n२०१९ पर्यंत देशातील प्रत्येक घरात शौचालय उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी राबविलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा आवर्जुन उल्लेख करून अहवालात म्हटले आहे की, ज्या देशांमध्ये अजूनही ५६० दशलक्ष लोक उघड्यावर शौच करतात, त्या देशात इतके मोठे अभियान राबविणे लहान कार्य नाही. पण, मोदी यांनी ते हाती घेतले आणि पहिल्याच वर्षात मोठे यशही मिळविले.\nअभियानाची सुरुवात दमदार झाल्यामुळेच आतापर्यंत ८० लाख शौचालये बांधणे शक्य झाले आहे. या अभियानाला आणखी निधी उपलब्ध करण्याची आणि गती वाढविण्याची गरज आहे. बर्‍याच नागरिकांचा दृष्टिकोन बदलला असला, तरी मोठ्या प्रमाणात नागरिक अजूनही जुन्याच विचारांचे आहेत. मोदी सरकार या अभियानात नक्कीच यशस्वी होईल, असा आम्हाला विश्‍वास असल्याचेही अहवालात नमूद आहे.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nदहशतवादाला कोणत्याही देशाने थारा देऊ नये\n=पंतप्रधान मोदी यांची भूमिका= क्वालालाम्पूर, [२२ नोव्हेंबर] - इसिसच्या वाढत्या क्रौर्यामुळे दहशतवाद जगापुढील सर्वांत मोठे आव्हान आहे, असे स्पष्ट करताना ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://graphologyonline.wordpress.com/", "date_download": "2018-08-18T10:45:02Z", "digest": "sha1:XLFJFWOXUFZR5ROM7VS7J4X7FF52YUPQ", "length": 54074, "nlines": 159, "source_domain": "graphologyonline.wordpress.com", "title": "Graphology Online | Handwriting Analysis, Counseling, Psychology", "raw_content": "\nअक्षरावरून स्वभाव विश्लेषण हे विज्ञान आणि कलेचे मिश्रण आहे प्रत्येकाची स्वतंत्रपणे व्यक्त होण्याची पद्धत ही खूप खोलात जाऊन, चाचणी केल्यावरच निश्चित करता येते. यात तपशीलवार गणती आणि मिळवलेल्या माहितीची व्यवस्थित योजना करणे गरजेचे असते. हे झाल्यावरच व्यक्तीचा प्रमुख व वैशिष्ट्यपूर्ण स्वभाव लक्षात येतो. Graphology चा कलेच्या माध्यमातून विकास होतानाही दिसतो. अक्षरतज्ञ हा निरीक्षणांमधून आणि छोट्या छोट्या सांकेतिक गुणांमधून एक व्यक्तिमत्त्व रेखाटत असतो. म्हणून मला वाटतं, विज्ञान आणि कलेच्या संगमातून एक अचूक व्यक्तिमत्त्व निर्माण होताना आपण प्रत्यक्ष पाहू शकतो. ही व्यक्तिमत्त्व रेखाटण्याची कला, खूप वर्षांच्या अनुभवातून आणि स्वतःला व इतरांना समजून घेण्यातून वाढत जाते.\nआज आपण Regularity आणि irregularity म्हणजे काय पाहूया. (म्हणजेच नियमित व अनियमित अक्षर)\nएकंदर लांबून कागदाकडे पाहिल्यावर ते एकसारखं लिहिलेलं आहे की त्यात भरपूर बदल होत आहेत हे कोणालाही समजत. या भरपूर बदलांमध्ये आकार कमी जास्त होणं, अक्षरांमधील, 2 ओळींमधील अंतर असमान असणं, अक्षर उजवीकडे किंवा डावीकडे झुकलेलं असणं यासारख्या गोष्टी असतात. यावरून आपण ते नियमित, एकसलग, एकसारखं आहे की अनियमित हे ठरवू शकतो.\nउदाहरण द्यायचे झाले तर नियमितपणा असलेले, मोठे, सुसंघटित अक्षर; आत्मविश्वास, स्वतःला उत्तमरीत्या व्यक्त करता येणे, उत्साह, चैतन्य आणि कामसुपणा असलेले व्यक्तिमत्त्व दाखवते.\nहेच मोठे अक्षर जर अनियमित असेल तर उद्धटपणा, तुटक स्वभाव, असभ्य बोलणं आणि मन मानेल तसं वागणारी व्यक्ती म्हणून व्यक्तीचित्र रेखाटते.\nहे sample regularity चं एक उदाहरण म्हणून आपण पाहू शकतो. हे google वरून घेतलेलं sample आहे.\nकागदाकडे पहाताचक्षणी आपल्याला एकंदर नियमितपणा लक्षात येतोच. ज्याच्या हस्ताक्षरामध्ये सुसंगती आणि निश्चीतपणा असतो, एकसारखं लिहिण्याचं सातत्य असतं, त्या व्यक्तीमध्ये विचार आणि वागण्यामध्ये निश्चितता दिसते. त्यांच्या चालण्यामध्ये आत्मविश्वास जाणवतो. बोलण्यामध्ये सुसंगतता असते. जर त्या व्यक्तीने लिहायला पेन उचलला तर, अक्षरात एक स्थिरता दिसते. सगळीच अक्षर एकसारखी, टंकलेखन केल्यासारखी नक्कीच नसतील, पण एक तुलनात्मक नियमितपणा आपोआपच जाणवेल.\nRegularity ही अनेक गोष्टींमधून दिसते. काही खाली नमूद करत आहे.\nपानाच्या चारही बाजुंनी समतोल समास सोडलेला असतो.\nCapital आणि small (lower case) अक्षरं ही एकमेकांना शोभतील अश्या प्रमाणात असतात.\nसंपूर्ण पानाकडे पाहता, अक्षरांचा झुकलेला कल (slant) सुसंगत, वारंवार न बदलणारा असतो.\nबऱ्याचशा अक्षरांची उंची मिळती जुळती असते.\nएकंदर लेखनाकडे पहाता हस्ताक्षर साधं, समजण्यास सोपं, कुठलीही गुंतागुंत नसलेलं, वाचण्यायोग्य, आणि स्पष्ट व स्वच्छ असेल तर त्यातून नियमितपणा दिसतो. अक्षरांची आखणी उत्तम असेल तर दृष्टीलाही आणि माणूसाचा सहवासही सुखकारक असतो.\nRegularity आणि बाकीच्या उत्तम गुणांची एकत्रित मांडणी करता एक मस्त स्वभाव समजून घेता येतो. त्या व्यक्तीमध्ये एक अंतःस्थ स्थिरता जाणवते. सगळीकडेच.. विचारात, भावनांमध्ये आणि कामातही.. अश्या अक्षराचे लोक विश्वसनीय असू शकतात. त्यांच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीमध्ये अनावश्यक बदल जाणवणार नाहीत.\nहे sample irregularity चं एक उदाहरण म्हणून आपण पाहू शकतो. हे google वरून घेतलेलं sample आहे.\nसमास असमतोल, एकसारखा नसलेला,\ncapital आणि lower case अक्षरांचा ताळमेळ नाही. काही लहान काही मोठी.\n(Slant) भरपूर पुढे मागे होणारी अक्षरं\nअक्षरांची उंची कमी जास्त\nएकंदर regularity च्या पूर्णपणे विरुद्ध असलेलं अक्षर\nया प्रकारच्या लिहिण्यातून समजतं की लेखक धरसोड वृत्तीचा आहे. स्वतःच्या मतांवर हा ठाम नसतो. अनिश्चित. विचार आणि भावना बदलत रहाण्याची शक्यता जास्त असते. गोंधळलेली व्यक्ती. या व्यक्तींना स्पष्टता नसते. या लोकांनी स्वतःला शिस्त लावलेली नसते आणि आयुष्याचं गणितच ते कदाचित चुकीच्या दृष्टिकोनातून मांडतात.\nअति एकसारखं, साचेबद्ध अक्षर:\nहे sample साचेबद्ध लिखाणाचं एक उदाहरण म्हणून आपण पाहू शकतो. हे google वरून घेतलेलं sample आहे.\nवर नमूद केल्यापैकी जर रेगुलरीटी/ नियमितपणा असलेल्या हस्ताक्षराच्या सर्वच गोष्टी सातत्याने लागू होत असतील तर ते अति शिस्तबद्ध हस्ताक्षर असते. आपण लावलेला स्वभावाचा अर्थ खरा असेलच याची शक्यता कमी. खूप जास्त एकसारखेपणा आणि अनैसर्गिकपणे दिसणार समान अक्षर हे प्रविण्यानी मिळवता येतं. अश्या लोकांना परिस्थितीशी जुळवून घेताना कमी त्रास होतो आणि spontaneity असते असं ते जगासमोर मांडतात. शक्यतो तो एक प्रकारचा makeup असण्याची शक्यता जास्त असते..\nमी वर सांगितलेल्या स्वभाव विश्लेषणांमध्ये काही त्रुटी असलेले स्वभाव तर काही चांगले गुण असलेले स्वभाव कसे ओळखावे हे सांगितलं आहे. पण हस्ताक्षरावरून व्यक्तीला समजून घेताना हे लक्षत ठेवणं गरजेचं आहे की, प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळ्या वातावरणात वाढलेली असते. त्या व्यक्तीला येणाऱ्या अनुभवांमधून ती घडत जाते. बालपणातल्या, तरुण्यातल्या आणि पुढे येत जाणाऱ्या अनुभवांमधून आपण स्वतःला बदलत जातो. जगाशी वागण्याच्या पद्धती आपण बदलतो.. कदाचित मन मानत नसेल पण अनुभवांनी शिकवलं असेल म्हणून आपण ठराविक पद्धतीने react होतो. त्यामुळे हस्ताक्षरावरून labeling करण्यापेक्षा माणूस म्हणून भावना समजून घेणं महत्वाचं. वरच्या मार्गदर्शनावरून स्वतःच्या भावना समजून घ्या आणि इतरांनाही समजून घ्या. आपण कुणालाही वाईट पटकन म्हणू शकतो पण ती व्यक्ती वागण्यामागचं करण समजून घेतलत,संवाद साधला तर माझ्या या लेखाचा उपयोग झाला असं मला वाटेल. सध्या आपल्याला या technology च्या जगात, ‘माणसांनी माणसाच्या भावना समजून घेण्यासाठी’ “संवाद” हा एकच उत्तम मार्ग आहे. त्यासाठीचं हस्ताक्षरविज्ञान (graphology) या विषयावर मी लेख लोहितीये. याचा तुम्हाला उपयोग होईल ही अपेक्षा. माझ्या लेखांचा तुम्हाला उपयोग झाल्यास नक्की Reply द्या. माझ्याशी संवाद साधा. प्रश्न विचारा.. मला नक्कीच आवडेल.\nLong weekend संपत आला आहे so विचार केला routine चालू व्हायच्या आधी तुम्हाला अजून थोडं graphology बद्दल सांगावं. मागच्या वेळी आपण margins, spacing आणि baseline बद्दल वाचलं. या लेखात आपण slant बद्दल समजून घेऊ.\nआपल्या भावनिक प्रतिक्रिया या slant मधून समजतात.\nमला वाटत माणसाला समजून घेण्यामध्ये त्याच्या क्रिया-प्रतिक्रिया समजून घेणं आणि त्यामागे अडकलेली भावनांची गुंतागुंत लक्षात घेणं गरजेचं असतं. ‘भावनिक गुंता’ ऐकूनच जड वाटतं तर ते समजून घेऊन सोडवायला जाणं तर फारच अवघड काळजी करू नका, व्यक्तित्वामधील अवघड गोष्टी समजून घेण्यासाठीच तर मानसशास्त्र आहे. आणि graphology हा एक त्यातलाच भाग. व्यक्तीच्या भावना हा एक अविभाज्य भाग असतो माणसाचा. आणि त्या भावना आपण व्यक्त कशा करतो यावर त्याचं व्यक्तीमत्व अवलंबून असत. आपण आनंदी आहोत की दुःखी आहोत हे मनात ठेवणारे काही लोक असतात तर काही लोक पटकन बोलून टाकतात. काही जणांना या भावना स्वतःपाशीच ठेवायच्या असतात तर काहींना स्वतःहून सांगायच्या असतात, त्यांना लक्ष वेधून घ्यायचं असत.\nआपले आचार आणि विचार हे व्यक्तिमत्वाचा पाया असतात असं म्हणलं तर वावगं नाही. भावनांमुळे आपण आपल्या आयुष्यातल्या घटनांना आणि माणसांना प्रतिसाद देतो. आपण व्यक्त होतो म्हणजेच आपल्या आतल्या आवाजाला बाहेरच्या जगपर्यंत एका पुलावरून चालत जायला मदत करतो.\nआता या भावना माणूस व्यक्त कशा करतो ते आपण अक्षरामधून पाहू शकतो. ते असं:\nअक्षरे उजवीकडे किंवा डावीकडे कुठल्या बाजूला कललेली/ झुकलेली असतात यावरून तुम्ही व्यक्त कसे होता हे समजतं. जितकी उजवीकडे कललेली अक्षरे असतील तेवढी त्या व्यक्तीचा भावनिक प्रतिसाद देण्याची क्षमता जास्त असते. अक्षरे जितकी मागे, डावीकडे कललेली असतील तेवढा माणूस अलिप्त राहण्याचा जास्त प्रयत्न करतो. सहसा लवकर व्यक्त होत नाही.\nअक्षरे जास्त उजवीकडे झुकलेली असतील तर माणसाच्या भावना त्याच्या विचार आणि कृतींपेक्षा वरचढ असतात. पण व्यक्त होताना या slant बरोबरच हस्ताक्षर-मधील बाकीच्या facts पाहणं पण गरजेचं असतं.\nसाधारण 90° मध्ये अक्षर असतील तर त्या व्यक्ती तर्कशुद्ध (logical) असतात. अश्या लोकांचा स्वतःच्या भावना व्यक्त करण्यावर खूप ताबा असतो. सहसा ते भावना पटकन व्यक्त करत नाहीत. खूप क्वचितच त्यांच्या भावना निर्णय घेण्यामध्ये येतात. सहसा त्यांचे निर्णय हे logical जास्त आणि भावनिक कमी असतात. हे शांत स्वभावाचे असतात. कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी ते सगळ्या शक्यतांचा विचार करतात. या व्यक्ती योग्य की अयोग्य, यातून पैसे मिळतील का, आपल्या निर्णयाचे परिणाम काय होतील; असा सारासार विचार करून निर्णय घेतात. या व्यक्तींना भावना असतात पण त्या व्यक्त करण्यावर त्या खूप नियंत्रण ठेवतात.\nउजवीकडे झुकलेली अक्षर असतील तर व्यक्ती खूप बोलकी असते. तिला इतरांना मदत करायला आवडतं. स्वतःचा आतला आवाज ऐकून ते react होतात. त्यांचे निर्णय हे भावनांवर आधारलेले जास्त असतात. भावनावश व्यक्ती असतात या. त्यांना संवाद साधण्याची गरज वाटते. भावना व्यक्त करण्याची आवश्यकता असते. अक्षरे जेवढी जास्त उजवीकडे झुकलेली असतील तेवढी ती व्यक्ती जास्त भावनावश असते. या लोकांना अभिप्राय महत्वाचा वाटतो. इतर कोणी अभिप्राय दिल्यावर हे खुश होतात उजवीकडे झुकलेल्या प्रमाणावरून याचे BC, CD, DE, E+ असे प्रकार आहेत.\nया मध्ये बाकीची अक्षरे पाहणे पण तेवढेच महत्वाचे असते. हा लेख एक मार्गदर्शक म्हणून लिहिलेला आहे. यात खोलात जाऊन अजून खूप अभ्यास असतो, तो संपूर्ण अभ्यास एकत्रित करून मगच आपल्याला personality describe करता येते. Slant किंवा मागच्या लेखातील माहिती ही खूप मूलभूत आहे\nडावीकडे अक्षर झुकलेल्या व्यक्ती या स्वतःला व्यक्त होण्यापासून थांबवतात. अश्या व्यक्ती नेहमी स्वतःच्या संरक्षक गरजांवर जास्त लक्ष केंद्रित करतात. खूप काळजीपूर्वक वागतात. अश्या व्यक्तींमध्ये भीती किंवा स्वार्थ या भावना जास्त असण्याची शक्यता असते. बाकीच्या अक्षरांबरोबर हे जुळवून पाहावे लागते. या व्यक्तीनी स्वतःच एक कवच बनवलेलं असत त्या मध्ये त्या आनंदी असतात. दुसऱ्यांपेक्षा यांना स्वतःमधून, आतून प्रेरणा मिळते. यांनी भावना दाबून ठेवलेल्या असतात मनामध्ये. अक्षरे जितकी मागे झुकलेली असतील तेवढी जास्त मानसिक भीती लोकांना असते. जितकं अक्षर मागे झुकलेलं तेवढं भावनिक सहभाग कमी असण्याचा प्रयत्न असतो. यामध्ये अक्षर किती मागे झुकते त्यावरून FA आणि G असे प्रकार आहेत.\nहे वाचल्यावर आपल्याला प्रश्न नक्कीच पडू शकतो की माझं अक्षर नेहमीच बदलत, माग मी कसा आहे तर सहसा slant बदलत नाही. भावनिक चढउतार, जवळच्या व्यक्तीचं जाणं, किंवा खूप खोलवर रुतेल अशी एखादी घटना झाली तरच slant बदलते.\nज्या लोकांची slant सहसा एकसारखीच राहते अश्या लोकांच्या आयुष्यात भावनिक स्थिरता असते. लोकांशी वागण्यामध्ये फारसे बदल नसतात.\nकाही लोकं 2-3 प्रकारच्या slants मध्ये लिहितात. ह्या लोकांना निर्णय घेण्यामध्ये त्रास होतो कारण नेहमीच त्यांचं मन एक सांगत असत आणि बुद्धिमत्ता काहीतरी वेगळं सांगते. Logically निर्णय घ्यायचा का emotionally या कोड्यात अडकलेले असतात हे. अश्या लोकांना असुरक्षित वाटायला लागलं तर ते एकदम बंद होतात. बऱ्याचदा बोलता बोलता ते विषय सोडून देतात आणि शरण जाऊन विषय बंद करण्याचा प्रयत्न करतात. हे सुद्धा बाकीच्या अक्षरांबरोबर तपासून पाहणे गरजेचे असते.\nव्यक्तीच्या मनातल्या भावना वाचायला शिकायचं असेल तर तुम्हाला या ‘slant’ बद्दल अजून खोलात जाऊन पाहावं लागेल. मदत लागली तर मी आहेच\nतुमच अक्षर इथे पोस्ट करा आणि तुम्ही सांगा slant कुठला मी चूक की बरोबर सांगीन मी चूक की बरोबर सांगीन करून तर पाहूया जमतंय का तुम्हाला अक्षरावरून स्वतःला समजून घ्यायला…\nगेल्या काही दिवसात सगळ्यांनी हस्ताक्षरावरून स्वभाव कसा समजू शकतो यावर हजारो प्रश्न विचारले मग विचार केला या महिन्यात कुठल्या अक्षरामधून काय समजत, आम्ही या हस्ताक्षर विज्ञानाचा कसा उपयोग करतो आणि यातील मुख्य संकल्पना काय हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा.\nमानसशास्त्रामध्ये स्वभावातील गुणधर्म, वैशिष्ट्य समजून घेऊन त्यावर काम करण्यासाठी अनेक पद्धती आहेत. त्याचपैकी Graphology ही एक वैज्ञानिक पद्धत. मानसशास्त्रामधील हस्ताक्षरावरून स्वभाव समजून घेणं ही सगळ्यात पटकन होणारी चाचणी आहे असं आपण म्हणू शकतो.\nतर कागदावर लिहिल्या नंतर स्वभाव 2 पद्धतीने समजून घेता येतो.\nकागदाकडे लांबून नजर टाकून स्वभाव समजून घेणं\na-z अक्षरांकडे तपशीलवार पाहून स्वभाव पडताळून पाहणं.\nआज आपण कागदाकडे पाहून स्वभावाचा येणारा एक आढावा कसा कळेल ते पाहूया. यात मी 3 गोष्टींबद्दल बोलणार आहे.\nअक्षरांखालील दृश्य किंवा अदृश्य रेघ (Baseline)\nमी इथे जे काही लिहिणार सांगणार आहे ते एकाच दृष्टिकोनातून आणि ठराविक प्रमाणातच तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतीये जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल अक्षरावरून स्वभाव कसा समजून घेता येतो यात अनेक पैलू आणि वैशिष्ठ्ये अजून असतात. तुमच्यासाठी खास काही tips:\nमुळात आपण कागद पेन घेऊन लिहायला बसायचा मूळ उद्देश हा असतो की आपले विचार समोरच्या पर्यंत पोहोचावेत. जर कागदावर स्पष्ट, सुवाच्य अक्षरात लिहिले असेल तर त्या व्यक्तिमत्व बद्दलही आपण तसेच म्हणू शकतो. बऱ्यापैकी स्वच्छ व्यक्तिमत्व खोलात गेल्यावर बाकीचं कळतंच. ज्या लोकांचं सुवाच्य अक्षर नसतं, अश्या व्यक्तींना समजून घेण्यासाठी केलेला हा प्रयत्न.\nलिहिलेल्या कागदावर एक नजर टाकल्यावर पानाच्या डाव्या बाजूला भूतकाळातील प्रत्त्येक गोष्ट आणि स्वतः बद्दल सांगता येतं. यात पालकांशी असलेलं नात, आपली मानसिकता, बालपण अश्या अनेक गोष्टी कळतात. तर उजव्या बाजूला भविष्यात येणाऱ्या आव्हाहनांना कसे पेलताय आणि इतरांना कसे वागवता हे खोलात जाऊन समजून घेता येत. यात तुमची ध्येय, आत्मविश्वास आणि अनेक गोष्टी पाहता येतात.\nकागदावर लिहिल्यावर चारही बाजुंनी एक समास सोडलेला असतो. यात अंतर सोडण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. त्यावरून व्यक्तीचा स्वभाव ठरतो. समासावरून (margins) माणसाच्या संवाद साधण्याच्या कौशल्यांवर (interaction with other people) आणि कशा पद्धतीने आपण जगतोय यावर लक्ष केंद्रित केलं जातं. यात डावी कडे, उजवीकडे, वर आणि खाली सोडलेल्या अंतरासाठी वेगळे अर्थ असतात. काही लोक कितीही मोठे झाले तरीही आई-वडीलांवर अवलंबून असतात. जगासमोर एकटं, असुरक्षित वाटतं अश्या लोकांना.. सगळी काम स्वतःची स्वतः करतही असतील कदाचित पण सतत कोणाचा तरी आधार लागतो; तर काही लोकं जन्मतःच धडाडी असतात. Risks घ्यायला त्यांना आवडत आणि स्वावलंबी व्यक्तिमत्व असतंअश्या काही लोकांना समजून घेण्यासाठी या काही टिप्स: डावीकडे सोडलेल्या margin कडे पाहिल्यावर हे 3 प्रकार दिसतात.\n1. पाहिल्यावर लक्षात येते की असं लिहिणारी व्यक्ती घरच्यांशी खूप connected आहे. ती इतरांवर अवलंबून आहे.\n2.या व्यक्ती घरच्यांपासून भावनिक रित्या दूर जात आहेत अस समजतं\n3.या प्रकारची लोकं समोरच्या व्यक्तीला, परिस्थितीला कुशलतेने हाताळू शकतात. इथे मग त्यांना खोट बोलावं लागलं तरी ते पुढेमागे पाहत नाहीत.\nअश्या प्रकारे उजवीकडे, डावीकडे, वर आणि खालच्या margins वर काम करून त्या व्यक्तीची personality समजते.\nकाही लोक खूप काम करतात, अनेक parties ला जातात, स्वतःच्या छंदांना वेळ देतात थोडक्यात सगळंच करताना दिसतात.. आपण नेहमी विचार करतो कसं काय जमत असेल हे त्याचं उत्तर लिहिलेल्या कागदाकडे पाहिल्यावरच कळतं. समान अंतर सोडून, भरपूर गोष्टी, एकमेकांमध्ये न अडकता जर लिहिलेल्या असतील तर ती व्यक्ती वरील वर्णनाप्रमाणे असते\nदोन ओळी, शब्द आणि अक्षर यामध्ये कमी, जास्त किंवा असमान अंतर आहे हे पहाताच क्षणी जाणवतं. या अंतर सोडण्यावरून व्यक्तीचं नियोजन आणि त्या नियोजनाची होणारी अंमलबाजावणी (planning and execution) पाहता येते. त्याची विचार करण्याची पद्धत कळते.\na. दोन ओळींमध्ये एकसारखे अंतर-: नियोजन आणि त्यांची अंमलबजावणी उत्तम\nb. दोन ओळींमध्ये जास्त अंतर-: नियोजन करायला आणि ते आमलात आणायला खूप वेळ लागतो.\nc. दोन ओळींमध्ये असमान अंतर-: बालपण खराब गेल असण्याची शक्यता. आत्मविश्वासाची कमतरता. या व्यक्तींमध्ये नियोजन करण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याची क्षमता कमी पडते.\nयाच प्रमाणे शब्द आणि अक्षरांमधील सोडलेल्या अंतरामधून स्वभाव कळतो. प्रत्येक stroke मधून वेगळे गुणधर्म कळतात.\nज्या रेघेचा आधार घेऊन आपण लिहितो (दृश्य किंवा अदृश्य रेघ) ती कशी जातीये त्यावरून स्वभाव ओळखता येतो. यावरून आपल्याला स्वतःवरचा control कळतो. या पेक्षा खोलात जाऊन समजून घ्यायचे झाले तर baseline ही अनियंत्रित असली तरीही खूप महत्त्वाची असते व्यक्तीला समजून घेण्यामध्ये. ज्या घटनांवर व्यक्तीमत्व उभे असते त्या आधारस्तंभाचे चित्रीकरण baseline आपल्या समोर करते. यामुळे माणसाला सत्य परिस्थिती ची असलेली जाणीव समजते. नाती सांभाळण्याचे कौशल्य आणि सर्व भावना एकत्रितपणे तरीही स्पष्ट तुम्हाला मांडता येतात का हे या baseline मधून कळते फारच पुढचा विचार सांगायचा झाला तर baseline ही सत्य परिस्थिती काय आणि सुप्त मनामध्ये नक्की काय चाललंय याची विभागणी करून आपल्यासमोर मांडते.\ni) वर जाणारी ओळ:\nअसं लिहिणारी लोकं उत्साही, आनंदी, नेहमी काहीतरी चांगलं होईल असा विचार करणारी, आशावादी, कष्टाळू असतात.\nii) खाली जाणाऱ्या ओळी:\nया लोकांमध्ये कमी उत्साह असतो. आळशी असतात असही म्हणू शकतो आपण. खिन्न मनस्थिती मध्ये असतात आणि अश्या लोकांच्या आयुष्यात त्यांना न आवडणाऱ्या बऱ्याच गोष्टी होत असतात. लहान मुलांमध्ये किंवा मोठ्यांमध्ये हे दिसत असेल तर त्यांना बोलतं करण्याची गरज असते. सहसा अश्या व्यक्तीला मनातलं व्यक्त केल्याने मदत होते. काही जणांसाठी हा आयुष्यातला तात्पुरता टप्पा असू शकतो जिथे मदतीची गरज असते. अथवा हे लोक आळशी प्रकारात मोडतात..\nलांबून नजर टाकल्यावर कागदावर वरील गोष्टी कळतात तसेच या खालील काही गोष्टी पण कळतात ज्यावर मी पुढच्यावेळी लिहीन. पुढे काय असेल याचा साधारण अंदाज, बघा intersting वाटतंय का…\nअक्षरे उजवीकडे किंवा डावीकडे कुठल्या बाजूला कललेली असतात हे समजून घेणं\nकिती दाब देऊन तुम्ही कागदावर लिहिता हे पहिले जाते. त्याबद्दल माहिती.\nअक्षरांची जोडणी कुठल्या पद्धतीने होतीये त्यावर स्वभाव कळतो.\nअक्षराच्या आकारावरूनही स्वभाव कळतो\nवर नमूद केलेली माहिती खूप थोडकी आहे. (Tip of iceberg). व्यक्तिमत्व परीक्षण करण्यासाठी तपशीलवार अभ्यास करणे गरजेचे असते. Graphology हा विषय सामान्य लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्यांना या बद्दल माहिती मिळावी म्हणून मी हे article लिहिले आहे. यातील खोलवर माहिती मिळवण्यासाठी तज्ञांचा सल्ला घेऊ शकता. अथवा contact: 8806222779 भाग्यश्री.\nया आणि अश्या अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी वाचत राहा आणि मला feedback देत राहा मला तुमची प्रत्युत्तर वाचायला नक्कीच आवडेल.\nहा लेख awareness साठी लिहिलेला आहे. हा आणि असे बरेच लेख इथून पुढे प्रत्येक महिन्याला लिहिण्याचा मी प्रयत्न करीन. चिकित्सक वृत्तीने वाचलं तर प्रत्येकाला यातून स्वतःसाठी महत्वाच काहीतरी मिळेलच. प्रयत्न करून पाहा आणि हो feedback ची वाट पाहतीये…\nतुम्ही हे वाचताय, आणि तुम्ही रोबोट नाहीए, म्हणजेच तुम्ही कधी ना कधी लिहायला शिकला आहात लिहिताना तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का लिहिताना तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का एकत्रच, एकसारखं, एकाच वर्गात शिकूनही प्रत्येकाचं अक्षर इतकं वेगळं कसं असतं एकत्रच, एकसारखं, एकाच वर्गात शिकूनही प्रत्येकाचं अक्षर इतकं वेगळं कसं असतं कसं काय काही लोकं खूप वळणदार लिहितात तर, काही अगदी मुंगी कागदावरून चालत गेल्या सारखं कसं काय काही लोकं खूप वळणदार लिहितात तर, काही अगदी मुंगी कागदावरून चालत गेल्या सारखं काही अगदी सुवाच्य तर, काही खूपच गचाळ, न वाचता येण्या सारखं काही अगदी सुवाच्य तर, काही खूपच गचाळ, न वाचता येण्या सारखं तुमच्या या आणि अश्या अनेक प्रश्नांची गुपितं सोडवण्यासाठी ग्राफोलॉजी हि एक किल्ली आहे. ग्राफोलॉजी मध्ये हस्ताक्षरावरून व्यक्तिमत्वाचे, स्वभावाचे परीक्षण केले जाते तुमच्या या आणि अश्या अनेक प्रश्नांची गुपितं सोडवण्यासाठी ग्राफोलॉजी हि एक किल्ली आहे. ग्राफोलॉजी मध्ये हस्ताक्षरावरून व्यक्तिमत्वाचे, स्वभावाचे परीक्षण केले जाते तुमच्या अक्षरातून कळणाऱ्या गमती-जमती, काही तुमच्या स्वभावातील गुण दोष जे तुम्हालाही उलगडले नसतील, स्वभाव वैशिष्ठ्ये, तुमचे पैलू तसंच तुम्ही काम वेळेवर करता की पुढे ढकलता या सारख्या अनेक गोष्टी अक्षरातून समजतात तुमच्या अक्षरातून कळणाऱ्या गमती-जमती, काही तुमच्या स्वभावातील गुण दोष जे तुम्हालाही उलगडले नसतील, स्वभाव वैशिष्ठ्ये, तुमचे पैलू तसंच तुम्ही काम वेळेवर करता की पुढे ढकलता या सारख्या अनेक गोष्टी अक्षरातून समजतात विश्वास ठेवायला अवघड जात असला तरी हे अगदी १००% खरं आहे. हस्ताक्षरावरून व्यक्तिमत्व समजून घेण्याच्या या शास्त्राला ग्राफोलोजी (graphology) असे म्हणतात. थोडक्यात माणसाचा स्वभाव आजकाल आपल्याला हस्ताक्षरावरून कळतो विश्वास ठेवायला अवघड जात असला तरी हे अगदी १००% खरं आहे. हस्ताक्षरावरून व्यक्तिमत्व समजून घेण्याच्या या शास्त्राला ग्राफोलोजी (graphology) असे म्हणतात. थोडक्यात माणसाचा स्वभाव आजकाल आपल्याला हस्ताक्षरावरून कळतो ‘काय आजची पिढी हे नवनवीन शोधून काढून त्यात career करते कोणास ठाऊक ‘काय आजची पिढी हे नवनवीन शोधून काढून त्यात career करते कोणास ठाऊक’ अस वाटणाऱ्यांसाठी एक सांगणं आहे, अहो आहात कुठे’ अस वाटणाऱ्यांसाठी एक सांगणं आहे, अहो आहात कुठे हे ४०० वर्ष जुनं शास्त्र आहे हे ४०० वर्ष जुनं शास्त्र आहे आत्ता कुठे भारताला त्याची जराशी ओळख व्हायला लागलीये. लेखणीतल्या शाईच्या प्रवाहातून कागदावर उमटणाऱ्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करणारे आम्ही अभ्यासक आत्ता कुठे भारताला त्याची जराशी ओळख व्हायला लागलीये. लेखणीतल्या शाईच्या प्रवाहातून कागदावर उमटणाऱ्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करणारे आम्ही अभ्यासक हे शास्त्र अगदी कोणालाही शिकता येते, यासाठी वयोमर्यादा नाही.\nहस्ताक्षर परीक्षण म्हणजे अक्षरावरून, शास्त्रीय पद्धतीने व्यक्तिमत्वातले गुण-दोष ओळखणे, त्याचे मूल्यमापन करणे व व्यक्तीला समजून घेणे होय. समोरील गंभीर प्रसंगी तुमचे भावनिक प्रतिसाद, एकाग्रता, विचार करण्याची पद्धत, आत्मसन्मान, आत्मविश्वास, स्वसंरक्षणासाठीच्या पद्धती, भीती, करारीपणा, स्वावलंबी आहात की परावलंबी, संवाद कौशल्य, कामातील सातत्य, व्यक्तिमत्वातील अद्वितीय वैशिष्ठ्य या सारख्या अनेक गोष्टी फक्त अक्षराकडे पाहून कळतात\nग्राफोलोजी म्हणजे काय समजल्यावर साहजिकच मनात प्रश्न निर्माण होतो ह्याचा मला काय उपयोग तर हे सर्व वयोगटांसाठी उपयुक्त आहे तर हे सर्व वयोगटांसाठी उपयुक्त आहे जसे व्यवस्थापकांना त्यांच्या कार्यक्रमामध्ये मनोरंजन म्हणून, नवीन व्यवसाय चालू करताना आपला भागीदार योग्य आहे का जसे व्यवस्थापकांना त्यांच्या कार्यक्रमामध्ये मनोरंजन म्हणून, नवीन व्यवसाय चालू करताना आपला भागीदार योग्य आहे का हे समजून घेण्यासाठी, नोकरीसाठी भरती करताना त्या जागी योग्य व्यक्तीची निवड करण्यासाठी, पोलिसांना मदत, कागदपत्रांच्या परीक्षणासाठी, कोर्टमध्ये न्यायनिवडा करण्यासाठी, समुपदेशकांना समोरील व्यक्तीला त्याच्या नकळत समजून घेण्यासाठी, तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे व्यक्तिमत्व विकासासाठी याचा वापर होतो. लहान मुलांसाठी अभ्यासाबरोबरच जीवनावश्यक कौशल्ये आणि व्यक्तिमत्व विकसित होणे हे सध्याच्या जीवनात अत्यावश्यक आहे. त्यासाठी ग्राफोलॉजी चा उत्तम वापर होतो. लहान मुलेच कशाला, मोठ्या लोकांनाही सुधारणेची गरज असतेच की हे समजून घेण्यासाठी, नोकरीसाठी भरती करताना त्या जागी योग्य व्यक्तीची निवड करण्यासाठी, पोलिसांना मदत, कागदपत्रांच्या परीक्षणासाठी, कोर्टमध्ये न्यायनिवडा करण्यासाठी, समुपदेशकांना समोरील व्यक्तीला त्याच्या नकळत समजून घेण्यासाठी, तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे व्यक्तिमत्व विकासासाठी याचा वापर होतो. लहान मुलांसाठी अभ्यासाबरोबरच जीवनावश्यक कौशल्ये आणि व्यक्तिमत्व विकसित होणे हे सध्याच्या जीवनात अत्यावश्यक आहे. त्यासाठी ग्राफोलॉजी चा उत्तम वापर होतो. लहान मुलेच कशाला, मोठ्या लोकांनाही सुधारणेची गरज असतेच की\nअक्षरात बदल घडवून आणल्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये सुधारणा करण्याचा एक सोप्पा उपाय शोधला आहे ग्राफोलॉजीस्टनी. जुनी म्हण होती स्वभावाला औषध नाही पण खरंतर बदलायची मनापासून इच्छा असणाऱ्यांसाठी ‘स्वभावाला औषध आहे’ ग्राफो-थेरपीमुळे (अक्षरामधील काही वळणे (strokes) बदलल्यामुळे) स्वभावात बदल होतो, अनेक भीती कमी होतात, आत्मविश्वास वाढतो, ध्येय ठरवून त्या पर्यंत पोहोचण्याची योग्य दिशा गवसते, संवाद कौशल्य सुधारतात, समजून घेण्याची तसेच जबाबदारी पेलण्याची क्षमता वाढते, चिडचिड कमी होते, एखाद्या घटनेला कुशलपणे हाताळता येते, नातेसंभंध सुधारतात, व्यक्ती गरज असेल तिथे पुढाकार घेते, इतकेच काय अगदी विविध आज़ार बरे करायलाही मदत होते. ग्राफो-थेरपीमुळे बुजरेपणा कमी होऊन योग्य ठिकाणी योग्य वेळीं आपण स्वतःला व्यक्त करायला शिकतो. या सारखे अनेक फायदे झालेले मी गेली अनेक वर्षे पाहतीये. मी स्वतः निराशेनी ग्रासलेल्या लोकांना परत सकारात्मक विचार करताना पाहिलंय. १२ वी मध्ये बोर्डात, प्रिलिम्स पेक्षा २७% गुणांमध्ये वाढ झालेली पाहिली आहे. २ भिन्न व्यक्तीमत्वच्या व्यक्ती एकमेकांना अनुरूप आहेत कि नाही हे अक्षरावरून कळाले आहे\nग्राफो-थेरपीमुळे उत्तम व्यक्तिमत्व विकसीत झालेले अनेकजण आज या समाजात वावरत आहेत. स्वतःला प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर सुधारणे खरंच सोप्पे आहे फक्त मनाची तयारी हवी तुमच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी संधी तुमचा दरवाजा ठोठावत आहे. स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या या नव्या पायवाटेवर चालण्याचा प्रयत्न करून बघा तुम्ही आयुष्यात अनेक नवीन यशशिखारे गाठू शकाल \nहस्ताक्षरावरून व्यक्तिमत्वाची ओळख February 14, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F/", "date_download": "2018-08-18T10:58:01Z", "digest": "sha1:AGFXUA7GJVC43EEOL4ORN5ELDWTLATE7", "length": 14958, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "अमित शहांनी घेतली रतन टाटांची भेट - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे…\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची…\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Maharashtra अमित शहांनी घेतली रतन टाटांची भेट\nअमित शहांनी घेतली रतन टाटांची भेट\nमुंबई, दि. ६ (पीसीबी) – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियानातंर्गत आज (बुधवार) मुंबईत दाखल झाले आहेत. शहा यांनी सायंकाळी ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेतली. दरम्यान, भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यासोबतची भेट रद्द करण्यात आली आहे.\nअमित शहा यांनी साडेचारच्या सुमारास रतन टाटा यांची भेट घेतली. तसेच यावेळी मोदी सरकारने मागील ४ वर्षात केलेल्या कामगिरीची माहिती दिली. सोबत त्याबाबतचे बुकलेट भेट दिले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार व्ही. सतिश आदी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी रतन टाटा यांना शिवाजी महाराजांवरील एक पुस्तक भेट दिले. शिवाजी महाराजांचा आज राज्याभिषेक दिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने फडणवीस यांनी टाटा यांना हे पुस्तक भेट दिले.\nPrevious articleरिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात वाढ; कर्जाचा हप्ता वाढणार\nNext articleहिंजवडीतील बंटी बबलीने लावला महाराष्ट्र बँकेला ७० लाखांचा चुना\nयमुनानगरमध्ये पालिकेच्या कचरा वेचक ट्रकची तोडफोड\nखासदार आनंदराव अडसूळ यांना अटक करण्यासाठी नवनीत राणांचा धडक मोर्चा\nआरक्षणाची मागणी समस्यांच्या नैराश्यातून\nयवतमध्ये पोलिसांवर दगडफेक; वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर जखमी\nअनुसूचित जमातींमध्ये समावेशासाठी धनगर समाजाचा एल्गार\nअाज शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या स्वतंत्र बैठका; मराठा आरक्षणप्रश्नी भूमिका निश्चित करणार\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nमी शून्यात गेलो, भावना उफाळून येत आहेत; वाजपेयींच्या निधनामुळे मोदींना शोक\nमावळ आणि शिरूर लोकसभेसाठी भाजपच्या संघटनात्मक बांधणीला वेग; प्रत्येक बुथवर २५...\n२०२२ मध्ये भारत पहिली अंतराळ यात्रा काढेल; पंतप्रधान मोदींचा विश्वास\nमाजी पंतप्रधान राजीव गांधी दलितविरोधी होते – पंतप्रधान मोदी\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमल्टिप्लेक्समध्ये स्नॅक्स ५० रुपयांतच मिळणार, न्यायालयात दावा न टिकल्याने राज दरबारी...\nअधिवेशनापूर्वी आरक्षण द्या: अन्यथा मराठा समाजाचा संयमाचा बांध सुटेल – मराठा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z80228211332/view", "date_download": "2018-08-18T09:58:22Z", "digest": "sha1:F7FLAOUS7FZANMOUHWP2EBETKMHH4A2G", "length": 20129, "nlines": 193, "source_domain": "www.transliteral.org", "title": "केशवस्वामी - श्लोक संग्रह २", "raw_content": "\nनिर्जीव गाड्यांची पूजा करतात, यामागील शास्त्र काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|केशवस्वामी|\nकेशवस्वामी - श्लोक संग्रह २\nकेशवस्वामी रामदास पंचायतनातील प्रख्यात साधू असून महानभगवद्‌भक्त व अंतर्निष्ट आणि मोठे निस्पृह वक्ते होते.\nभवीं या भया पासुनी सोडवीलें पदीं स्थापुनी चित्सुखे गौरवीलें ॥\nदयावंत ते संत नाथ माझे सदा सद्रुपि कीर्ति त्याची विराजे ॥५१॥\nभवाचा विरोधी न रोधी मनातें समाधिस्त बोधेवरी चिद्‌ घनाते ॥\nजनांते वनातें तया निर्जनातें न जाणे सदा पावला निर्मनातें ॥५२॥\nभ्रमाच्या लयीं कामवैरी निमाला भ्रमाच्या लयीं चिन्मई योग झाला ॥\nभ्रमाच्या लयीं दाटला देव देही भ्रमाच्या लयीं केशवीं देह नाहीं ॥५३॥\nभव भयांतक मंगळ योगें रतिपती हरता अतिवेगे ॥\n सुखनिधी भरला हरिअंगीं ॥५४॥\nभजन पथ विचारें चालता गोड वाटे त्रिभुवन जनकासी चिंतिता प्रेमदाटे ॥\nह्मणवुनि मनगंगे लोट आला सुखाचा नयन कमलद्वंद्वें चालिला पाटसाचा ॥५५॥\n ह्मणवुनि पतनीं पडतांहो ॥\nहरि करीं असतां रडतां हो हित कसें स्वरुपीं परतां हो ॥५६॥\n विलोकिती अद्वय भाजनाला ॥\nजे सेविती अक्षर भोजनाला नव्हेति या गोचर भोजनाला ॥५७॥\nभावें सदा संत पदाब्ज जोडा पूर्वील हे सर्वहि वोढि सोडा ॥\nकरा कथा चित्र विचित्र गोडा फोडा तुह्मी अंतक वक्रखोडा ॥५८॥\nभक्ता विरक्ता भवताप मुक्ता हा ठावुका राम सभाग्यवंता ॥\n विलासुनि ग्रासुनि शोकमोहो ॥५९॥\nविलोकितां सद्गुरु चंद्रमा हो गेली लया शोकमई अयाहो ॥\n झाली सिमा सर्व सुखासि घेते ॥६०॥\nविलोकितां संत समर्थ पाया संसार गेला अवघाचि वाया ॥\nनिमग्न झाले अचरी अपारी यालागि मी केवळ निर्विकारी ॥६१॥\nवानु दयाळा तुजला कितीरे देऊनि हातीं निज संपतीरे ॥\nमी देव ऐसा मज बोध केला यालागि माझा भववेध गेला ॥६२॥\n निष्काम तीर्थींच मनास न्हाणा ॥\nनिरंतरा सर्व गतासि जाणा मी तोचि तोमी प्रचितीस आणा ॥६३॥\n चिन्मात्र तोही बरवा निवला ॥\n आत्मत्व बोधें भजतां तयाला ॥६४॥\nजनीं वनीं हरि लक्षुमि खेळे उघडुनि निज निर्मळ डोळे ॥\nतरि जडाजड वेदन नासे अति सुखें हरि सर्वहि भासे ॥६५॥\nविज्ञान मंत्रावळि प्राप्त झाली हृत्पंकजीं अक्षरवस्तु आली ॥\nनिःशेष गेली समनिष्क माया यालागि नाहीं मजलागि काया ॥६६॥\nविषय वर्जुन साधन त्यागिती अचळ होउनि चिद्‌घन भोगिती ॥\nपरम मंगळ दायक ते भले निजपदारुढ केवळ देखिले ॥६७॥\nविरक्तिहे टाकुनि ज्यासि गेली ज्याच्या गृहींहूनि दया पळाली ॥\nक्षमा जया पूर्ण उदासि झाली त्याच्या पदीं भ्रांति फळासि आली ॥६८॥\n विदारिले शोकघना मनाते ॥\n यालागि मी अक्षर पूर्णराशी ॥६९॥\nविचारें बरें वृत्ति सोज्वल्य केली तनूदायनी शीघ्र तेणेंचि मेली ॥\nजगज्जाल हा पूर्ण चिद्गोळ झाला मुनी सर्वदा आत्मलाभें निवाला ॥७०॥\n निर्दाळिले म्या भवघोर चक्रा ॥\nझालों सुखी देह नव्हेचि ठावा आतां कसा काळ करिल दावा ॥७१॥\n संसार झाला समसार रासी ॥\nगेल्या क्रिया सर्व सुखालयासि बोले कवी आत्म विवाहवासी ॥७२॥\nउपरमे ममता अति बोलिली ह्मणउनि समता मज भाळली ॥\nकवळुनी धरली मग सादरें सममुखें न दिसे तव दूसरें ॥७३॥\n निजसुखें निवती अतिवेगें ॥७४॥\nविषय वमन त्यागी सर्वसंगीं विरागे कवळुनि हरिलागीं तो असे सानुरागें ॥\nह्मणवुनि तनु भागा नातळे सर्व दागा करुनि त्रिविध यागा पावला चित्पदागा ॥७५॥\n सत्‌शास्त्र हें सादर आयकाहो ॥\nकरा क्रिया मंगळ दायकाहो सेवा सदोदीत विनायकाहो ॥७६॥\n समर्पिता चित्तशशी तयाशी ॥\nमी सर्वदा आत्मप्रवीण झालों भेदेविना पूर्णसुखें निवालों ॥७७॥\n हे नातळे चित्त कदापि कामा ॥\n तोडी क्रियाजाळ परेश जोडी ॥७८॥\n ब्रह्मार्णवीं मज्जति वेळ वेळां ॥\nहे जाणती सर्वहि ब्रह्मपाही त्या वेगळें आणिक ब्रह्मनाहीं ॥७९॥\n नारायणी चित्त निवांत रक्षा ॥\nक्षरा करा ब्रह्मसुखे भवाची ऐसें कवी मंगळशास्त्र वाची ॥८०॥\nलघुनाम ज्यासि कांहीं न साचे गुरुनाम हें बोलतां देव लाजे ॥\nअसा तो गुरु संचला पूर्णपाही तया लक्षितां विश्व झालेंचि नाहीं ॥८१॥\nलखलखी गगनीं विज जैशी हरिकथा श्रवणीं मति तैशी ॥\n निजपदीं मिरवें निजभोजे ॥८२॥\n संसार हे केवळ नाम ज्याचें ॥\nनिर्नाम तो नाम महामुनी हो विलोकिता सर्व श्रमाधुणीहो ॥८३॥\nनिष्काम तीर्थी निजवास केला जळोनियां पातकराशि गेला ॥\nआनंद झाला बरवा मनींहो मनास ही वेच निरंजनीं हो ॥८४॥\n निर्नामनामा रमणीय रामा ॥\n स्वानंदथारा मज दे उदारा ॥८५॥\n जाणेल तो एक मरोनि वांचे ॥\nऐश्वर्य ह्मणणें ह्मणणेचि खोटें हे लोटले सर्व अचिंत्यलोटे ॥८६॥\n वेदांत शास्त्रींच अखंडजागे ॥\n भेटेल वेगीं तरि पूर्ण जाणा ॥८७॥\n न करितां गतिची बरवी कथा ॥\nन भजता हृदयीं हरिची कथा अति कथा करणें तितुकें वृथा ॥८८॥\nनारायणीं जो नर थांबला रे संसार त्याचा दुरि लांबलारें ॥\n झाला नसे यागती पळाला ॥८९॥\nनिराश्रमीं आश्रम आजि केला वर्णाश्रमाचा श्रम सर्व गेला ॥\nविमुक्त झालों बरवा निवालों अवाच्यते मी गुज काय बोलो ॥९०॥\nनिरसुनी मद मत्सर मेले हरिपदीं स्थिर होउनि ठेले ॥\nतरि दिसे हरि सर्वही पाही हरि विना मग कांहींच नाहीं ॥९१॥\nनिष्काम धामीं रमती यतीहो यालागि मायातम नेणतीहो ॥\nघेती निजानंद प्रकाश गोडी त्याची दया ब्रह्मकटाह मोडी ॥९२॥\nनिष्काम बोधें परिपक्व झाले अपार हें आत्मप्रकाश ल्याले ॥\nते भेटले तारक ब्रह्मयोगी यालागिं झालों परब्रह्मवेगीं ॥९३॥\nनिवांत जो चिन्मय दीपदावी क्षरीं सदा सन्मय राम दावी ॥\nत्याच्या पदीं तन्मय नित्य व्हावें कवी ह्मणे अद्वय सूख घ्यावें ॥९४॥\nनिरंतरी संत दयाळ सेवा निरंतरीं राम मनींच ठेवा ॥\n निरंतरी अद्वयलाभ घ्या हो ॥९५॥\nनिराकार संकल्प ग्रासूनि पाहे निराधार संपूर्ण जाणूनि राहे ॥\nनिरालंब जो याचि देहींच झाला नमस्कार माझा तया योगियाला ॥९६॥\nनामें तोडी काम संकल्प बेडी त्याच्यापायीं लागली पूर्ण गोडी ॥\nमाया वेडी नासली भेद खोडी भाग्यें आह्मी जोडिला राम जोडी ॥९७॥\nनिःशेष माया मय पाश तोडूं बोधें चिदानंद घनाशि जोडूं ॥\n भोगूं सुखें बुद्ध अभोग्य पद्म ॥९८॥\nनिजकरीं धरुनि हरि दाविती हरि पदी बरवी रतिलाविती ॥\n क्षणभरी भजतां भव वोसरे ॥९९॥\nनानापरी ऐक हरी असेहो हरी क्रिया जलप तया दिसेहो ॥\nदिसे तरी दृश्य तरी नसेहो स्वयें सदोदीत हरी वसेंहो ॥१००॥\nदुसरा पंधरवडा ; वद्यपक्ष .\nखटल्यांतील दुसरी बाजू ; प्रतिवादी ; सामनेवाला .\nपितृपक्ष . भाद्रपद वद्य पक्ष ; पितृपंधरवडा . आला विप्र महाधनी अपरपक्ष करणें मनीं - गुच ३६१२ . [ सं . ]\nसोळा वर्षाखालील मुलांना शनिची साडेसाती कां त्रस्त करत नाही\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A2%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%A6.html", "date_download": "2018-08-18T11:10:14Z", "digest": "sha1:NKVL22I5QPPQ5J2KZGFPFPOJ4PEIXZ4L", "length": 21959, "nlines": 292, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | मंगळावरही नासाला आढळले दोन एलियन्स", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, विज्ञान भारती » मंगळावरही नासाला आढळले दोन एलियन्स\nमंगळावरही नासाला आढळले दोन एलियन्स\n=ट्रॅफिक सिग्नलचा वापर करताना टिपले छायाचित्र=\nन्यूयॉर्क, [२७ सप्टेंबर] – मंगळाचा अभ्यास करण्यासाठी अमेरिका आणि भारताचे यान एकामागोमागच या तपकिरी ग्रहावर पोहोचले. भारताच्या यानाने मंगळाच्या कक्षेत दाखल होताच भूपृष्ठाचे पहिले छायाचित्र पाठविल्यानंतर आता अमेरिकन नासाच्या क्युरिओसिटी रोव्हरनेही मंगळावरील आगळेच छायाचित्र पाठविले आहे. या छायाचित्रात दोन एलियन्स चक्क ट्रॅफिक सिग्नल्सचा वापर करून रस्ता ओलांडताना दाखविले आहेत.\nमंगळावर प्रवेश करताच भूपृष्ठावरील वातावरणाचा शोध घेण्यात व्यस्त झालेल्या रोव्हरने या एलियन्सचे छायाचित्र आपल्या कॅमेरात टिपले आणि ते नासाच्या नियंत्रण कक्षाकडे पाठविले. अनआयडेंटिफाईड फॉरेन ऑब्जेक्टचा (युएफओ) सातत्याने अभ्यास करणारे ब्रिटनचे अभ्यासक जोसेफ व्हाईट यांनीही नासाच्या वेबसाईटवरील हे छायाचित्र तपासल्यानंतर एलियन्स ट्रॅफिक सिग्नल्सचा वापर करीत असल्याबाबत त्यांनीही पुष्टी केली आहे.\nअगदी सुरुवातीपासूनच नासाकडून प्राप्त होणार्‍या छायाचित्रांचा मी नेहमीच अभ्यास करीत आलो आहे. नासाची वेबसाईट मी नियमितपणे तपासत असतो. नासाकडून मात्र अद्याप याबाबत कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. सूत्राच्या मते, एलियन्ससारखी दिसणारी ही दोन्ही छायाचित्रे मोठ्या आकाराच्या दगडासारखी आहेत. त्यामुळे आताच याबाबत कुठलेही मत व्यक्त करता येणार नाही.\nउद्या पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूर\nपाणी संपताच बाटलीही होईल गायब\nआता सूर्यप्रकाशाने निघणार कपड्यांवरचे डाग\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nभाजपा महायुतीलाच संपूर्ण बहुमत : फडणवीस\nनागपूर, [२६ सप्टेंबर] - राज्यात निर्माण झालेल्या निराळ्या स्थितीचा विचार करता, भाजपा व सहकारी घटकपक्ष यांच्या भाजपा महायुतीच्या माध्यमातून येती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87.html", "date_download": "2018-08-18T11:10:21Z", "digest": "sha1:BE2TBGPMCEJKCZO37X7AWWDDY7ONHCS3", "length": 23622, "nlines": 293, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | राहुल गांधीच कॉंगे्रसचे भावी अध्यक्ष", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » राहुल गांधीच कॉंगे्रसचे भावी अध्यक्ष\nराहुल गांधीच कॉंगे्रसचे भावी अध्यक्ष\n=सोनियांचे प्रदेश कॉंगे्रस समित्यांना पत्र=\nनवी दिल्ली, [१७ जानेवारी] – सततच्या पराभवांमुळे कॉंगे्रस पक्षात नेतृत्वाच्या मुद्यावरून कलह निर्माण झाला असतानाच, कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सर्व राज्यांच्या प्रदेश कॉंगे्रस समित्यांना पत्र लिहून, राहुल गांधी हेच पक्षाचे भावी अध्यक्ष राहणार आहेत, असे स्पष्ट संकेत दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.\nपक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाच पुढे जाऊन कॉंगे्रसचे नेतृत्व करायचे आहे. विकास आणि उदारतावादी विचारातून राहुल गांधीच देशाला पुढे नेणार आहेत. पक्षाला मजबूत करण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच असल्याने पक्षजनांनी त्यांच्या नेतृत्वाचा फायदा करून घ्यावा, असे आवाहनही सोनियांनी या पत्रात केले असल्याचे एका वृत्तपत्राच्या वृत्तात म्हटले आहे.\nगेल्यावर्षीच्या मे महिन्यात झालेली लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर विविध राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंगे्रस पक्षाच्या पदरी पराभवाशिवाय दुसरे काहीच आले नाही. या पराभवामुळे नेते आणि कार्यकर्ते खचून गेले. त्यातच पक्षाचे वादग्रस्त सरचिटणीस दिग्विजयसिंह आणि अन्य वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व सोपविण्याची मागणी केली. काही नेत्यांनी तर सोनिया व राहुल यांनी विश्रांती घ्यावी आणि गांधी परिवाराबाहेरील व्यक्तीकडे पक्षाची सूत्रे सोपवावी, अशी भूमिका घेतली. पक्षात नेतृत्वाच्या मुद्यावरून कलह निर्माण झाला असतानाच, सोनियांनी या पत्राद्वारे यासंबंधीच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.\nदरम्यान, पुढील मार्च किंवा एप्रिलमध्ये अ. भा. कॉंगे्रस समितीचे महाअधिवेशन होण्याची शक्यता असून, या अधिवेशनातच राहुल गांधी यांची पक्षाध्यक्षपदी निवड जाहीर होईल असे बोलले जात आहे. सोनिया गांधी यांची प्रकृती चांगली नसल्याने शक्य तेवढ्या लवकर पक्षाची सूत्रे राहुल गांधींच्या हाती देण्याची सोनियांची योजना आहे. काही वरिष्ठ नेत्यांच्या मते, येत्या सप्टेंबर महिन्यात पक्षात संघटनात्मक निवडणुका होणार असून, तेव्हाच राहुल गांधी यांची अध्यक्षपदी निवड होऊ शकते.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (2216 of 2453 articles)\nपेट्रोल, डिझेल पुन्हा स्वस्त\n=अच्छे दिन’ची मालिका सुरूच, अबकारी करातही वाढ= नवी दिल्ली, [१६ जानेवारी] - देशवासीयांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्याची आणि महागाईच्या विळख्यातून ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://marathiinfopedia.co.in/2018/08/09/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-18T09:55:47Z", "digest": "sha1:A7N6E27TNRG65KSEXD5KIA237D52FM3X", "length": 13678, "nlines": 110, "source_domain": "marathiinfopedia.co.in", "title": "मराठी संज्ञा - MARATHI INFOPEDIA", "raw_content": "\nसंज्ञा वेगवेगळ्या भाषा बोलणारी माणसे एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्या भाषांची देवाण – घेवाण होते.\nइतर भाषांतील अनेक शब्द आपल्या भाषेत रूढ होतात. वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांच्या कामकाजांच्या संदर्भात किंवा रोजच्या बोलण्या – लिहिण्यातही त्यांचा सर्रास वापर केला जातो.\nइंग्रजी भाषेतील असे अनेक शब्द मराठी भाषेत रूढ झाले आहेत. अशा शब्दांना पारिभाषिक संज्ञा म्हणतात.\nसंज्ञा आणि त्याचे अर्थ पुढीलप्रमाणे :\nयाचा अर्थ लाकडाचा किंवा दगडाचा चौथरा होतो.\nचर्चमध्ये मेरी आणि येशूच्या मूर्तीपुढे जी रिकामी जागा असते तिला प्लॅटफॉर्म म्हणतात. ज्या ठिकाणी उभे राहून वक्ता भाषण करतो, चर्चा, कथाकथन, परिसंवाद, काव्यवाचन अशा गोष्टी जेथे सादर केल्या जातात.\nत्यालाही प्लॅटफॉर्म म्हणतात. विचार मांडणे, चर्चा करणे या गोष्टी ज्या उपक्रमाद्वारे केल्या जातात त्या उपक्रमालाही प्लॅटफॉर्म म्हणतात.\nस्टेशनला रेल्वे जेथे उभी राहते त्यालाही प्लॅटफॉर्म म्हणतात. प्लॅटफॉर्म हा शब्द अशा प्रकारे वेगवगळ्या संदर्भात वापरला जातो.\nफिचर याचा अर्थ आकार किंवा एखाद्या व्यक्तीच्या नाकाडोळ्यांची ठेवण. साधारणत: चांगल्या ठेवणीच्या संदर्भातच हा शब्द वापरला जातो.\nमासिकातल्या किंवा वृत्तपत्रातल्या एखाद्या लेखालाही फिचर म्हणतात. तीन तासांच्या पूर्णवेळ चित्रपटाला फिचर फिल्म म्हणतात.\nपाणी किंवा प्रकाश यांच्या संदर्भात हा शब्द वापरतात. एखादी गोष्ट मनात चमकून जाणे यालाही फ्लॅश होणे म्हणतात. फ्लॅश टाकणे ही क्रिया जास्तकरून रंगभूमीच्या संदर्भात वापरली जाते.\nएखाद्या घटनेवर किंवा व्यक्तीवर फ्लॅश टाकला की बाकी सर्व गोष्टी अंधारात जाऊन तेवढयाच एका गोष्टीवर प्रेक्षकांचे लक्ष केंद्रित होते. भूतकाळातील घटना दाखवण्यासाठीही या तंत्राचा वापर केला जातो.\nक्लोज – अप (समीप दृश्य)\n‘क्लोज-अप’ याचा अर्थ जवळून चित्रित केलेले दृश्य.\nएखाद्या गोष्टीचे चित्रीकरण खूप बारकाव्याने करायचे असले म्हणजे कॅमेरा व ते दृश्य किंवा व्यक्ती यांच्या मधले अंतर कमी करावे लागते, यालाच क्लोज-अप म्हणतात.\nचित्रीकरण किंवा फोटोग्राफी यांच्या संदर्भात हा शब्द वापरला जातो.\nनाटक सिनेमांतील पात्रांची निवड करणे, प्रत्येक दृश्याची पार्श्वभूमी ठरवणे, नट-नटयांना अभिनयाच्या बाबतीत सूचना देणे हे दिग्दर्शक करत असतो. एक प्रकारे नाटक-सिनेमा यांच्या संदर्भात डायरेक्टर हा सर्वेसर्वा असतो.\nअर्थातच नाटक-सिनेमा यांच्या संदर्भात हा शब्द वापरला जातो. काही बँकांच्या किंवा कंपन्यांच्या संचालकालाही डायरेक्टर म्हणतात.\nमनात जाग्या झालेल्या भावनेला अनुसरून हावभाव करणे, मुद्रेने, अंगविक्षेपाने मनातले भाव व्यक्त करणे यालाच अॅक्शन म्हणतात. आपण नेहमीच मनात उद्भवणाऱ्या भावांनुसार हावभाव करतो पण अॅक्शन किंवा अभिनय मात्र जाणीवपूर्वक केला जातो.\nअर्थातच त्याचा संदर्भ नाटक, सिनेमा, नृत्य या गोष्टींशी असतो. काही वेळा अॅक्शन हा शब्द कृती या अर्थानेही वापरला जातो. उदा. सरकारने याबाबत तातडीने अॅक्शन घ्यावी.\nकॉमेंटरी हा शब्द कॉमेंट या शब्दावरून आला. कॉमेंट म्हणजे टीका किंवा भाष्य. अर्थातच एखाद्या गोष्टीच्या चांगल्या वाईट बाजूंबद्दल बोलणे. एखादी गोष्ट घडत असते त्याच वेळी एखादी जाणकार व्यक्ती त्या संबंधीचे भाष्य किंवा निवेदन करत असते.\nआकाशवाणी, दूरदर्शन, क्रिकेटचा किंवा कुठल्याही खेळाचा सामना, एखादा कार्यक्रम किंवा मिरवणूक या संदर्भात हा शब्द वापरला जातो.\nन्यूज (वार्ता) याचा अर्थ काहीतरी नव्याने सांगणे. ‘न्यूज’ म्हणजे महत्त्वाची वार्ता असे म्हणण्यास हरकत नाही. वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन ही प्रसारमाध्यमे आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा साद्यंत तपशील देतच असतात. परंतु विशिष्ट संदर्भात एखादी महत्त्वपूर्ण बातमी देणे; हा वेगळा आणि महत्त्वपूर्ण संदर्भ त्या बातमीचे मूल्य ठरवतो. त्याला न्यूज व्हॅल्यू म्हणतात.\nउदा. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. एखादी बातमी किती खळबळजनक आहे यावर तिचे वार्तामूल्य अवलंबून असते.\nमुख्य शीर्षकाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी छोटया छोटया उपशीर्षकांचा उपयोग केला जातो, त्याला सबटायटल म्हणतात. जास्तकरून दूरदर्शनच्या संदर्भात हा शब्द वापरला जातो.\nपरकीय भाषेतील चित्रपट दाखवताना तो इतर भाषिकांना कळावा म्हणून त्या त्या भाषेतून उपशीर्षके दिली जातात.\nरिहर्सल म्हणजे एखाद्या गोष्टीची तालीम करणे. नाटकाचा पहिला जाहीर प्रयोग करण्याआधी केशभूषा – वेशभूषा करून प्रयोग सादर केला जातो, त्याला रिहर्सल म्हणतात. गाण्याच्या रीयाजालाही रिहर्सल म्हणतात.\nऑडियो म्हणजे ऐकू येणारे. आकाशवाणीवरून ऐकू येणाऱ्या कार्यक्रमांना ऑडियो कार्यक्रम म्हणतात.\nएखाद्या गोष्टीची जाहिरात करण्यासाठी मोठमोठी चित्रे किंवा काही मजकूर पोस्टरवर रंगवला जातो. ही चित्रे पत्र्यावर किंवा कापडावर काढली जातात. ती रस्त्यावर उंच ठिकाणी लावतात.\nहेतू हा कि या फलकांनी प्रत्येकाचे लक्ष वेधून घ्यावे. एखाद्या सिनेमाची किंवा उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी अशा पोस्टर्सचा उपयोग करतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D.html", "date_download": "2018-08-18T11:02:59Z", "digest": "sha1:PPDGDKTODAPL6TKUUIFKEDLTQMJ6BABE", "length": 22690, "nlines": 293, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | समाजाच्या हितासाठी गोहत्या टाळाच", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » समाजाच्या हितासाठी गोहत्या टाळाच\nसमाजाच्या हितासाठी गोहत्या टाळाच\nहैदराबाद, [१८ सप्टेंबर] – काही राज्यांमध्ये गोहत्येवर घालण्यात आलेली बंदी आणि त्यातच मुस्लिमांचा ईद-उल-अझा हा सण अवघ्या सात दिवसांवर आला असल्याने देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याची मागणी जोर धरत असतानाच, दक्षिण भारतातील काही मौलवींनी, समाजाच्या व्यापक हितासाठी गाय व बैलांचा बळी देण्याची प्रथा थांबवा, असे आवाहन केले आहे.\nवर्तमान स्थितीत मुस्लिम समाजानेही आपला मोठेपणा दाखवायला हवा आणि गाईंची कत्तल करण्याची जुनाट प्रथा बंद करून इस्लामध्ये परवानगी असलेल्या जनावरांचीच कत्तल करावी. यामुळे कुणाच्याही भावना दुखावणार नाही आणि देशातही शांतता कायम राहण्यास मदत मिळेल. ‘दावत-ए-दीन’ या शब्दाचा खरा अर्थ गरीब आणि गरजूंना पोटभर अन्न द्या, असा होतो, असे मौलवींच्या या गटाने स्पष्ट केले आहे.\nमौलवींच्या या विचारांना बहुतांश मुस्लिम शाळांनीही पाठिंबा दिला आहे. गोहत्या थांबविण्यात यावी, यासाठी सोशल मीडिया, बैठका आणि शुक्रवारच्या एकत्रित नमाजातून प्रचार करण्यात यावा, असेही त्यांनी म्हटले आहे. मुस्लिमांनी कायदा हातात घेऊ नये आणि गोहत्येपासून स्वत:ला दूर ठेवावे. यामुळे इस्लामची खरी शिकवण इतरांनाही मिळेल, असे या मोहिमेचे नेतृत्व करणारे इस्लामिक विचारवंत सईद हुसेन मदानी यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.\nगाय हिंदू धर्मासाठी वंदनीय आहे. आपण जेव्हा तिची कत्तल करतो, तेव्हा हिंदूंच्या भावना दुखावतात. यातून होणार्‍या उद्रेकात हिंसाचार घडून येतो. प्राणहानीसोबतच संपत्तीची हानीही होते. देशात अस्थिरता निर्माण होते. ही स्थिती टाळण्यासाठी मुस्लिमांनीही गाईंची कत्तल करण्याची प्रथा बंद करायला हवी, असे आवाहनही त्यांनी केले.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nकेजरीवालांचे आता डेंग्यूवरही राजकारण\nमहापालिकेवर पैसे खाण्याचा आरोप जंग यांच्या निर्देशांवर पंतप्रधानांना लिहिले पत्र नवी दिल्ली, [१८ सप्टेंबर] - राजधानी दिल्लीला डेंग्यू या ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%B6.html", "date_download": "2018-08-18T11:02:51Z", "digest": "sha1:FXP4E575LY2KDQC2PCY4LIVU57UX3PP6", "length": 52576, "nlines": 303, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | ‘आप’चे अपयश", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » संवाद » ‘आप’चे अपयश\n‘आप’चे अपयश – भ्रष्टाचार निर्मूलनाचा ज्वलंत प्रश्‍न हाती घेऊन निवडणुकीत उतरलेल्या आप पक्षाने स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांची निवड केली. अभिनव प्रचारपद्धती अवलंबिली. निधी गोळा करण्याची पारदर्शक पद्धती अवलंबिली. जनसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्याबद्दलची बांधिलकी व्यक्त केली. त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी भरपूर आश्‍वासने दिली. ही आश्‍वासने देताना ती पूर्ण करणे शक्य आहे की नाही, याची पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे, असे आपच्या नेत्यांना आवश्यक वाटले नाही. ही आश्‍वासने पूर्ण होण्याची शक्यता आहे की नाही, याचा विचार न करता, जनतेनेही आप पक्षातील नेत्यांच्या प्रामाणिकपणावर विश्‍वास ठेवला व त्यांना दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवून दिले. मात्र, पूर्ण बहुमत न मिळाल्याने स्वबळावर सत्ता स्थापन करता आली नाही. पण, कॉंग्रेसच्या पाठिंब्यामुळे अखेर सत्तारूढ होता आले. हे आपलाही अविश्‍वसनीय वाटणारे होते. आपने शपथविधीपासून प्रत्येक गोष्टीत आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, हे दाखविण्याचा आवर्जून व जाणूनबुजून प्रयत्न सुरू केला. आपल्या वागण्यातून इतर राजकीय नेत्यांपेक्षा आपण वेगळे आहोत, हे जनतेला कळण्यापेक्षा आपणच प्रसिद्धीची सर्व माध्यमे उपयोगात आणून हे जनतेला कळवावे, याची पुरेपूर काळजी आपच्या नेत्यांनी घ्यायला सुरुवात केली. त्यांनी काही धाडसी निर्णय घेतले. चौकशी समित्या नेमल्या, अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. भ्रष्टाचार केल्यास नोकरी जाण्याची भीती नोकरशहांच्या मनात निर्माण केली. आपला अपेक्षित असा जनलोकपालविषयक कायदा करण्याचे आश्‍वासन पूर्ण करायचे हे केजरीवालांनी ठरविले होते व त्यानुसार विधानसभेत त्यांनी विधेयक मांडलेसुद्धा. आपची लोकप्रियता सहन होत नसल्याने, कॉंग्रेस व भाजपा हे सरकार पाडण्याची संधीच शोधत होते. अशी संधी मिळताच त्यांनी आपपुरस्कृत जनलोकपाल विधेयकाला विरोध केल्याने ते विधेयक पारित झाले नाही व त्यामुळे राजीनामा देऊन हौतात्म्य मिळविण्याचा आपचा प्रयत्न यशस्वी झाला. केजरीवाल, लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने काम करायला मोकळे झाले.\nआपने इतर पक्षांना जबाबदार मानले असले, तरीही प्रत्यक्षात तोच पक्ष या स्थितीला पूर्णत: जबाबदार आहे व त्याने हाती आलेली सुवर्णसंधी गमावली, असेच सर्व घडामोडींचा बारकाईने अभ्यास केल्यास लक्षात येते.\nआपमध्ये योगेंद्र यादव यांच्यासारखे ज्येष्ठ विचारवंत प्रारंभापासून आहेत. केजरीवाल तर माजी सनदी अधिकारी आहेत. सनदी अधिकारी असल्याने त्यांना संविधानाचे, केंद्र-राज्य संबंधाचे, विविध कायद्यांचे, संसदीय पद्धतीचे, प्रचलित नियम आणि परंपरांचे, कायद्याचे राज्य या संकल्पनेचे, मंत्रिमंडळाच्या व कायदेमंडळाच्या अधिकार व मर्यादा यांचे उत्तम ज्ञान असेल, अशी अपेक्षा होती. दिल्ली या राज्याला इतर राज्यांपेक्षा कमी अधिकार आहेत. कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणाही या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित नसते, हे निवडणूक लढविण्यापूर्वी त्यांना माहीत असणे अपेक्षित होते. ज्या अर्थी त्यांनी विधिमंडळाची निवडणूक लढविली व नंतर मुख्यमंत्रिपद स्वकिरण्याचीही तयारी केली, तेव्हा आपण अत्यल्प अधिकार असलेले पद स्वीकारतो आहोत व अनेक निर्णय घेण्यासाठी आपल्याला राज्यपाल व केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे, हे त्यांना माहीत होते, असेच म्हणावे लागते. हे माहीत असूनही पद स्वीकारल्यानंतर कमी अधिकार आहेत, म्हणून तक्रार करण्यात काय अर्थ होता कॉंग्रेसच्याच शीला दीक्षितांच्या सरकारलाही जिथे पुरेसे अधिकार द्यायला केंद्र सरकार तयार नव्हते तिथे केजरीवालांच्या सरकारला ते अधिकार मिळतील, ही अपेक्षाच करणे चुकीचे होते. शिवाय असे बदल लगेचच करणे शक्यही नव्हते. त्यासाठी संविधानातच दुरुस्ती करायला हवी होती. अशी दुरुस्ती करणेही सोपे नसते. त्यामुळे व्यवस्थेत लगेचच बदल करता येतील, असे मानणे हीच चूक होती. आपल्या तक्रारीला केंद्र सरकार प्रतिसाद देणार नाही, हे त्यांच्या आधीच लक्षात यायला हवे होते. जनलोकपाल कायदा दिल्ली विधानसभा करू शकते का, त्यात केंद्र सरकार व नायब राज्यपाल यांची परवानगी घ्यावी लागेल का, हे स्पष्ट नसताना तसे आश्‍वासन देणे हेही मुळातच चूक होते. कारण मुळातच दिल्लीतील नायब राज्यपालास अधिक अधिकार आहेत, हे लक्षात घेतले गेले नाही. जनलोकपाल कायदा करूच, असे आश्‍वासन दिले असल्याने ते पूर्ण करतो असे दाखविणे गरजेचे होते व त्यामुळे ते विधेयक आपला विधिमंडळात मांडण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. मुळात असे आश्‍वासन देणेच चुकीचे होते. कारण ते पूर्ण करता येण्याची शक्यताच धूसर होती.\nमुख्यमंत्री झाल्यावर विधिमंडळाचा नेता म्हणून आपल्या काही जबाबदार्‍या असतात, याची केजरीवालांनी जाणीव करून घेतली नाही, असे वाटण्यासही जागा आहे. विधिमंडळाचे कामकाज कसे चालवायचे याचे नियम असतात. विधेयक मांडण्याची विशिष्ट पद्धत असते. सभागृहात सादर करण्यापूर्वी विधेयकाची प्रत सर्व सदस्यांना निश्‍चित कालावधीपूर्वी देणे गरजेचे असते. अधिवेशनात कोणते कामकाज होणार, यासंबंधीची कार्यक्रमपत्रिकासुद्धा सदस्यांना द्यावी लागते. विधेयकावर केव्हा व किती वेळ चर्चा होईल, काही विधेयकांसाठी कायद्यानुसार नायब राज्यपालांची पूर्व परवानगी घ्यावीच लागते, यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी मुख्यमंत्र्याला माहीत असणे अपेक्षित होते. जेव्हा या जनलोकपाल विधेयकावर चर्चा सुरू झाली तेव्हा या महत्त्वाच्या गोष्टींची योग्य अंमलबजावणी न झाल्याचे सदस्यांनी लक्षात आणून दिले याचा अर्थ, मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या संबंधित मंत्र्यांनी पुरेशी तयारीही केलेली नव्हती. यामुळे कॉंग्रेस आणि भाजपाच्या सदस्यांना विरोध करण्याची संधी आपनेच मिळवून दिली\nभ्रष्टाचार संपविण्यासाठी प्रभावी कायदा करण्याची गरज होती हे मान्य करूनही, असा कायदा केल्यानेच भ्रष्टाचार संपविता येईल, असे मानणे हेही सुज्ञपणाचे नव्हते. सद्य:स्थितीत उपलब्ध असलेल्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी केल्यास आणि उपलब्ध असंख्य यंत्रणांना कार्यक्षम केल्यास भ्रष्टाचारावर नियंत्रण आणता येऊ शकते, हे अनेक अभ्यासकांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे कायदा करण्यालाच प्राधान्य देणे व ते साध्य न झाल्याने पद सोडण्याचा त्याग करण्याची भाषा करणे हेही हास्यास्पदच होते. शिवाय असा कायदा करण्यासाठी इतर पक्षांची मदत घेण्याची भूमिका न घेता, हम करे सो कायदा ही वृत्तीही लोकशाही व्यवस्थेला न शोभणारीच होती. यात आपलीच भूमिका बरोबर, हा नैतिक अहंकार होता.\nव्यवस्थापरिवर्तनाची भाषा आपचे नेते वारंवार करीत होते व करीत असतात. जोपर्यंत व्यवस्था बदलणार नाही तोपर्यंत कोणतेच परिवर्तन शक्य नाही, असेही हे नेते वारंवार सांगत असतात. कोणत्याही व्यवस्थेचा हितसंबंधी गट उपयोग करून घेतात व ती इतर समाजघटकांसाठी शोषणाचे साधन होते, हे म्हणणे चुकीचे नाही. म्हणून व्यवस्था बदलविणे गरजेचे असते, हेही बरोबरच आहे, पण याचा अर्थ व्यवस्था बदलली म्हणजेच सगळे बदलते, असे मानणेही बरोबर नाही. कारण कोणतीही व कितीही आदर्श व्यवस्था स्वीकारली, तरीही तिचा आपले हितसंबंध जोपासण्यासाठी उपयोग करणारे सर्जनशील घटक तयार होतातच. असे घटक त्या आदर्श व्यवस्थेलाही शोषणाचे साधन बनवतातच\nकोणतीही राजकीय व्यवस्था आदर्श नसते. अशी आदर्श व्यवस्था असूच शकत नाही. कारण जसजशी परिस्थिती बदलत जाते तसतशी कितीही आदर्श राजकीय व्यवस्था असली, तरी तिच्यातील काहीनाकाही भाग किंवा प्रचलित कायदे तरी कालबाह्य होत जातातच. त्यामुळे तिच्यात बदल करावेच लागतात. तसेच कोणतीही व्यवस्था ही पूर्णत: चुकीची नसते. तिच्यात सातत्याने बदल करता येत नसल्याने तिच्याशी काही बाबतीत जुळवून घ्यावेच लागते. त्यामुळे राजकीय व्यवस्थेतील कोणत्या गोष्टी बदलायच्या व कोणते परिवर्तन कसे घडवून आणायचे, परिवर्तन करायचे म्हणजे नेमके काय करायचे, हितसंबंधी गटांना राजकीय व्यवस्थेला बटिक बनविणे शक्य होऊ नये यासाठी काय केले पाहिजे, या मुद्यांचा, व्यवस्थापरिवर्तनाची भाषा करणार्‍यांना विचार करावाच लागतो. पण, तसा तो बोलणारे करताना दिसत नाहीत.\nराजकीय व्यवस्थेत ढोबळ मानाने दोन-तीन पद्धतींनी बदल किंवा परिवर्तन घडवून आणता येते. राजकीय व्यवस्थेवर जनआंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने दडपण आणणे, ही एक पद्धत असते. राजकीय नेतृत्वाच्या जनविरोधी निर्णयांचा निषेध करणे, त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यास विरोध करणे, जनहितविरोधी निर्णय कायदे-नियम बदलविण्यासाठी आंदोलन करणे, जनसामान्यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ते कायदे करण्यासाठी संघर्ष करणे, अधिकारांचे हनन झाल्यास राज्यव्यवस्थेला अधिकारांची पुन:स्थापना करण्यास बाध्य करणे, यांसारख्या पद्धतींनी राजकीय व्यवस्थेत परिवर्तन आणता येते. ही पद्धत प्रभावी होण्यासाठी संघर्षासाठी केव्हाही तयार असणारे जनसंघटन असावे लागते. ते नसेल तर राजकीय व्यवस्थेवर दडपण आणणे अशक्य होते व अशा परिस्थितीत ही पद्धत अयशस्वी ठरू शकते. जनहितकारी कायदे करून व्यवस्थेत सर्व प्रकारचे बदल व परिवर्तन घडवून आणणे, ही दुसरी पद्धत असते. यासाठी राजकीय नेतृत्वाला बदलत्या परिस्थितीनुसार योग्य ते कायदे करण्यास, कायद्यात आवश्यक ते बदल करण्यास भाग पाडण्यावर भर दिला जातो. असे कायदे झाले, की आपोआप परिस्थितीत बदल घडून येईल, असे मानले जाते.\nया पद्धतीचे समर्थक, येता-जाता कायदा करण्याचीच भाषा बोलतात. तीच एकमेव प्रभावी पद्धत होय, असे मानतात. ही पद्धत अपयशी ठरली, तर काहीच करता येणार नाही, असे मानतात. आपच्या नेत्यांना नेमके असेच वाटत असावे. त्यामुळे जनलोकपाल कायदा करता आला नाही, हे लक्षात आल्यावर, आता सत्तेत असूनही आपल्याला काहीच करता येणार नाही, असे त्यांना वाटू लागले आणि त्याची परिणती सत्ता सोडण्यात झाली. खरे तर ही आपची मोठीच चूक होती. व्यवस्थेत शिरून तिच्यात आमूलाग्र बदल घडवून आणणे, हीसुद्धा एक प्रभावी पद्धत असते. त्यासाठी राजकीय व्यवस्थेत बदल घडवून आणण्याची इच्छा पाहिजे. व्यवस्थेत राहून व्यवस्थेत बदल घडवून आणता येत नाहीत, असे अनेक परिवर्तनवाद्यांना वाटते. पण, ते पूर्णत: खरे नसते. खरे तर व्यवस्थेच्या माध्यमातूनही खूप काही कार्य करता येऊ शकते. अल्पमतात असूनही आपला अनेक गोष्टी करता आल्या असत्या. आपला काय करता आले असते, याचा आता विचार करू या-\nसत्तेत आल्यावर आपल्या ध्येयधोरणांची अंमलबजावणी करताना एककल्ली पद्धतीने काम करणे अपेक्षित नसते. प्रत्येक बाबतीत विरोधी पक्षांवर टीका करण्याची किंवा त्यांच्या विरोधी निर्णय घेण्याचीही गरज नसते. तसेच आपला पक्ष सोडून इतर सर्व पक्ष भ्रष्टाचारी आहेत, अशी भूमिका घेणेही योग्य नसते. कारण असे सरसकट विधान करणेच मुळात चुकीचे असते. होताहोईतो सभागृहातील सर्व पक्षांतील सदस्यांच्या सहमतीने, त्यांच्याशी खुला संवाद करून निर्णय घेण्याची पद्धत अवलंबिणे अपेक्षित असते. अशा भूमिकेमुळे अनेक अनावश्यक संघर्ष सहजगत्या टाळता येतात. अन्यथा संघर्षात विनाकारण शक्तिपात होतो. आपने कॉंग्रेस व भाजपावर टीका करण्याचीच भूमिका घेतल्याने, सुसंवादापेक्षा वारंवार संघर्षाचेच वातावरण निर्माण झाले. विधानसभेत ठराव करून दिल्ली सरकारला व विधानसभेला अधिक अधिकार मिळावेत, ही मागणी करता आली असती. त्यासाठी सर्वच पक्ष तयार होते. कारण कॉंग्रेसच्या आधीच्या सरकारने तशी मागणी केली होतीच आणि भाजपाचीही तशीच मागणी होती. असा ठराव बहुमताने पारित झाला असता व त्यामुळे एक महत्त्वाचा मुद्दा जनतेसमोर मांडता आला असता. हे न करता विरोधी पक्षासारखे रस्त्यावर येऊन आंदोलन केल्याने हे अधिकार मिळणार नव्हते. सर्वसहमतीने असे ठराव करता आले असते. पण, आपने ही संधी गमावली.\nकायद्यांचा सर्जनशील अर्थ करून व्यवस्थेत बदल करता येऊ शकतो. कितीही काळजीपूर्वक कायदा केला, तरीही त्यात सर्वच गोष्टी नोंदविलेल्या नसतात. अशा वेळी राज्यकर्त्यांना सर्जनशीलपणे कायद्याची पुनर्व्याख्या करून निर्णय घेता येऊ शकतात. भारतीय संविधानातील तरतुदी व सर्वोच्च न्यायालयांचे निर्णय याकडे दुर्लक्ष न होऊ देता अशी व्याख्या करता येऊ शकते. हेच नियमांबद्दलही असते. शेषन यांनी निवडणूक आयुक्त झाल्यावर नेमके हेच केले, तर किरण बेदींनी तुरुंगाधिकारी म्हणून त्यांना असलेल्या अधिकारांची सर्जनशीलपणे पुनर्व्याख्या केली. त्यासाठी शांतपणे आपल्याला न मिळालेल्या अधिकारांपेक्षा मिळालेल्या अधिकारांचा अधिक बारकाईने अभ्यास करावा लागतो. आपच्या नेत्यांना हे अनेक कायद्यांच्या व नियमांंच्या बाबतीत करता आले असते. कॉंग्रेस व भाजपाच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी त्यांनी या कायद्यांचा व नियमांचा सर्जनशीलपणे अर्थ करण्याचा जरूर प्रयत्न केला व त्यामुळे अंबानी आणि काही केंद्रीय मंत्र्यांवर व राजकीय नेत्यांवर एफआयआर दाखल करण्यापासून ते चौकशी आयोग स्थापन करण्यापर्यंत त्यांनी मजल मारली. मात्र, असेच बरेच काही आपला करता आले असते. ती संधी आपने गमावली.\nव्यवस्थेतील नियमांमधे बदल करण्याचे व त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यानेही व्यवस्थेमध्ये अनेक सकारात्मक बदल घडवून आणता येतात. नवे कायदे व नियम न करताही सध्या प्रचलित असलेले कायदे व नियमही नीट राबविले गेले, तर सध्याची व्यवस्थाही उपयुक्त ठरू शकते. आपल्या देशातील खरी समस्या ही कायदे नसण्याची नाही, तर ती आहे की कायद्यांची आणि नियमांची अंमलबजावणीच होत नाही ही आहे. तेव्हा खरे तर कायदे आणि नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही, ही आहे. तेव्हा खरे तर कायदे आणि नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची चालून आलेली संधी आपने गमावली.\nआपच्या वतीने दुर्बल घटकांसाठी, गरिबांसाठी, श्रमजीवींसाठी काम करण्याचे आश्‍वासन वारंवार देण्यात आलेले होते. प्रत्यक्षात हे करण्याची संधी त्यांनी गमावली. दुर्बल घटकांसाठी केंद्र आणि राज्यसरकारच्या असंख्य योजना सध्या सुरू आहेत. या योजनांच्या अंमलबजावणीत खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. दिल्ली प्रदेशही याला अपवाद नसेल. या सर्व योजनांची उत्तम रीत्या अंमलबजावणी करण्याची संधी आपला मिळाली होती. पण, ते करणे आपला महत्त्वाचे वाटले नाही, असे दिसते. गरिबांची मुले ज्या शासकीय शाळांत जातात त्या शाळांमधून उत्तम शिक्षण मिळेल यासाठी प्रयत्न करणे व या शाळांमध्ये सर्व प्रकारच्या उत्तम सोयी उपलब्ध करून देणे अत्यंत उपयुक्त ठरले असते. याच पद्धतीने शासकीय रुग्णालयांमध्ये गरिबांसाठी उत्तम सोयी देणे, स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या सर्व योजना राबविणे व नव्या योजना करून त्यासाठी आर्थिक तरतूद करणे, हे महत्त्वाचे कार्य होते. झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छतेच्या सोयी करणेही कठीण नव्हते. याच पद्धतीने श्रमजीवींसाठीही व गरिबांच्या जीवनमरणाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी खूप कार्य करता आले असते. हे करण्यास कोणत्याच पक्षाने आपला विरोध केला नसता. यातून खर्‍या अर्थाने दुर्बल घटकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणता आले असते. हे करण्यापेक्षा एक कायदा करण्याला आपने सर्वाधिक महत्त्व दिले\nसत्तेत असणार्‍या पक्षाने प्रशासनावर जर योग्य नियंत्रण ठेवले व ते भ्रष्टाचार मुक्त ठेवण्याचा प्रयत्न केला, तर प्रचलित व्यवस्थेतूनही खूप सारे बदल व परिवर्तन घडवून आणता येऊ शकते. दिल्लीत पाच वर्षे भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याची संधी आपला मिळालेली होती. मात्र, अशी अमूल्य संधी त्या पक्षाने गमावली. या पक्षाला खरे तर अत्यंत दुर्मिळ अशी संधी मिळाली होती, पण तिचा सदुपयोग करण्यासाठी आवश्यक असलेली सर्जनशीलता मात्र नव्हती व त्यामुळे सारा वेळ वाया गेला.\nमोदी सरकारचे पुर्वेकडील समुद्रीसाहस\nउर्जित पटेल यांची निवड आणि आव्हाने\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअनादि मी, अनंत मी\nअनादि मी, अनंत मी - वेध एक स्वातंत्र्यवीर सावरकर गुलामी भेदू इच्छिणार्‍या यच्चयावत मानवांच्या मुक्तीचा महामंत्र गुलामी भेदू इच्छिणार्‍या यच्चयावत मानवांच्या मुक्तीचा महामंत्र युरोपातील वसंत आता मावळतीला ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/film-city-soon-lights-camera-action-38864", "date_download": "2018-08-18T11:06:09Z", "digest": "sha1:2QQEI36YLABRBMBE7DXNALSHZNSFVSWF", "length": 16679, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Film city soon lights-camera-action चित्रनगरीत लवकरच \"लाइट-कॅमेरा-ऍक्‍शन' | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 7 एप्रिल 2017\nकोल्हापूर - अनेक वर्षे वनवास भोगत असलेल्या येथील चित्रनगरीचे रुपडे आता पालटले आहे. 12 कोटींच्या निधीतून पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण होत आली असून, दुसऱ्या टप्प्यासाठी 16 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात जुन्या लोकेशन्सच्या डागडुजीसह पोलिस स्टेशन, कोर्टाची इमारत अशी पाच ते सहा नवीन लोकेशन्स तयार झाली आहेत. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत चित्रनगरीत प्रत्यक्ष चित्रीकरणाला प्रारंभ होणार आहे. चित्रीकरणाला मिळणारा प्रतिसाद पाहून लगेचच पुढील टप्प्यातील कामांनाही त्याच वेळी प्रारंभ होणार आहे.\nकोल्हापूर - अनेक वर्षे वनवास भोगत असलेल्या येथील चित्रनगरीचे रुपडे आता पालटले आहे. 12 कोटींच्या निधीतून पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण होत आली असून, दुसऱ्या टप्प्यासाठी 16 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात जुन्या लोकेशन्सच्या डागडुजीसह पोलिस स्टेशन, कोर्टाची इमारत अशी पाच ते सहा नवीन लोकेशन्स तयार झाली आहेत. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत चित्रनगरीत प्रत्यक्ष चित्रीकरणाला प्रारंभ होणार आहे. चित्रीकरणाला मिळणारा प्रतिसाद पाहून लगेचच पुढील टप्प्यातील कामांनाही त्याच वेळी प्रारंभ होणार आहे.\nचित्रनगरीच्या पायाभूत सुविधांसाठी मार्च 2016 मध्ये तीन कोटी 49 लाखांची निविदा प्रसिद्ध झाली. त्यातून पाटलाचा वाडा, स्टुडिओचे विस्तारीकरण, सुरक्षा रक्षक केबिन आदी सुविधा उपलब्ध झाल्या. त्याशिवाय नवीन डोमहाऊस व इतर कामांसाठी नऊ लाख 61 हजार, स्ट्रक्‍चरल रिपेअरिंग व इतर कामांसाठी 49 लाख 44 हजार, नवीन गार्डन लोकेशन्ससाठी 33 लाख 72 हजार, अंतर्गत प्रवेशद्वारासाठी सात लाख 66 हजार, वातानुकूलन यंत्रणा व इतर कामांसाठी 48 लाख 17 हजार, जिम्नॅशियम बिल्डिंगसह चेंजिंग रूम, टॉयलेट सुविधांसाठी 31 लाख तीन हजार, फायर फायटिंग सिस्टीमसाठी 34 लाख दहा हजार, कंपाउंड वॉलसाठी चार लाख 99 हजार अशा विविध निविदा प्रसिद्ध झाल्या. काही निविदांना प्रतिसाद मिळाला नसल्याने फेरनिविदा काढल्या. अनेक अडचणींचा सामना करून अखेर पहिल्या टप्प्यातील काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. चार किलोमीटरचे अंतर्गत रस्तेही पूर्ण झाले असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी आता स्ट्रीट लाइट उभारण्याचे काम सुरू होणार आहे.\nदरम्यान, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह विविध कला संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आज चित्रनगरीला भेट देऊन पाहणी केली. महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, उपाध्यक्ष धनाजी यमकर, माजी कार्यवाह भालचंद्र कुलकर्णी, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, अभिनेता आनंद काळे, स्वप्नील राजशेखर, संजय मोहिते, शरद चव्हाण, बाळा जाधव, अरुण भोसले, सुरेंद्र पन्हाळकर, सुरेखा शहा, बबिता काकडे, शोभा शिराळकर, छाया सांगावकर, विजय शिंदे, दिलीप भांदिगरे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.\nचित्रनगरीचे स्वप्न आता पूर्णत्वास येत आहे. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील काम करताना स्थानिक कलाकार व तंत्रज्ञांच्या सूचनांचा विचार होणे आवश्‍यक आहे. एकदा काम पूर्ण झाले की राहिलेल्या त्रुटी लवकर पूर्ण करता येत नाहीत. त्यामुळे अशा सूचनांचा विचार व्हावा, अशी अपेक्षा या वेळी भालचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी, अभिनेता आनंद काळे, स्वप्नील राजशेखर यांनीही झालेल्या कामाबाबत समाधान व्यक्त करताना विविध सूचना मांडल्या.\nचित्रनगरी परिसरात वृक्षारोपणासाठी गेल्या जुलैमध्ये निविदा निघाली. मात्र, त्याला कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाला नाही. आता हे काम सुरू होणार असून, खड्डे काढून दोन हजार झाडे लावली जाणार आहेत. खड्डे आणि इतर आवश्‍यक गोष्टींची पूर्तता मेअखेर करून 5 जूनला वृक्षारोपण केले जाईल.\nटाकवे बुद्रुक - सावित्रींच्या लेकींना दुस-या टप्प्यात पंधरा सायकलींचे वाटप\nटाकवे बुद्रुक - आंदर मावळाच्या मिंडेवाडी तील ठाकरवस्ती, चावसरवस्ती, जाधववाडीतून पायपीट करीत येणा-या विद्यार्थ्यांसह सावित्रींच्या लेकींना दुस-या...\nपिंपरी - दोन मुलांना मारून वडिलांची आत्महत्या\nपिंपरी (पुणे) - दोन मुलांना मारून वडिलांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना शनिवारी दुपारी ताथवडे येथे घडली. शुभम बर्मन (वय १०) रूपम वर्मा (वय...\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nसंग्रामपूर : वाण धरण ६५ टक्के भरले\nसंग्रामपूर : सातपुडा पर्वतामधील तीन जिल्ह्यांसाठी जलसंजीवनी ठरलेले वाण धरण 65 टक्के भरले आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या ...\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-road-works-municipal-corporation-50302", "date_download": "2018-08-18T10:37:19Z", "digest": "sha1:7BQQEFB3G3ZXL2E6XJNCTOXCVODXXNCL", "length": 14576, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news Road works municipal corporation पालिकेचे दुर्लक्ष रस्त्याची कामे अर्धवटच | eSakal", "raw_content": "\nपालिकेचे दुर्लक्ष रस्त्याची कामे अर्धवटच\nसोमवार, 5 जून 2017\nमुंबई - रस्तेदुरुस्तीच्या कामासाठी पालिकेने ३१ मे ही अंतिम तारीख कंत्राटदारांना दिली होती. मुदतीपूर्व रस्त्याची कामे पूर्ण करण्याचे आदेशही पालिकेकडून देण्यात आले होते. मात्र शहरातील अनेक ठिकाणी अद्यापही रस्तेदुरुस्तीची कामे चालू असल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे; तर अनेक ठिकाणी ३१ मेपासून रस्तेदुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे पावासाळ्यात रस्त्यांची अधिकच दुरवस्था होऊन नागरिकांचे हाल होण्याची शक्‍यता आहे. रस्तेदुरुस्तीअभावी रस्त्यांवर पाणी साचून खड्डे पडणे, वाहतूक कोंडी होणे, नागरिकांना चालणे अवघड होणे यासारख्या समस्यांचा सामना मुंबईतील नागरिकांना होण्याची शक्‍यता आहे.\nमुंबई - रस्तेदुरुस्तीच्या कामासाठी पालिकेने ३१ मे ही अंतिम तारीख कंत्राटदारांना दिली होती. मुदतीपूर्व रस्त्याची कामे पूर्ण करण्याचे आदेशही पालिकेकडून देण्यात आले होते. मात्र शहरातील अनेक ठिकाणी अद्यापही रस्तेदुरुस्तीची कामे चालू असल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे; तर अनेक ठिकाणी ३१ मेपासून रस्तेदुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे पावासाळ्यात रस्त्यांची अधिकच दुरवस्था होऊन नागरिकांचे हाल होण्याची शक्‍यता आहे. रस्तेदुरुस्तीअभावी रस्त्यांवर पाणी साचून खड्डे पडणे, वाहतूक कोंडी होणे, नागरिकांना चालणे अवघड होणे यासारख्या समस्यांचा सामना मुंबईतील नागरिकांना होण्याची शक्‍यता आहे.\nवडाळा ब्रिज मार्गाचे सहा महिन्यांपासून काम सुरू\nवडाळा येथील नाथालाल मेहता पुलापासून वडाळा ब्रिज मार्गावर रस्तादुरुस्तीचे बांधकाम सहा महिन्यांपासून सुरू आहे. अँटॉप हिल, प्रतीक्षानगर, बरकतअली नाका, बीपीटी कंटेनर या मार्गाला हा मार्ग जोडलेला आहे. वाहतुकीसाठी वडाळ्यातील हा मुख्य मार्ग असल्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी येथील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम होणे गरजेचे आहे.\nशिवडी - येथील शिवडी नाका टी. जे. रोडवर रस्ता रुंदीकरणाचे बांधकाम महापालिका एफ दक्षिण विभागाकडून पाच महिन्यांपासून सुरू आहे. अद्याप काम पूर्ण न झाल्याने या मार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. पावसाळ्यात या मार्गावर वाहतूक कोंडी होऊन वाहनचालकांच्या त्रासात वाढच होणार आहे.\nधारावी - पावसाळा तोंडावर आला तरीही धारावीतील अनेक रस्ते नादुरुस्त आहेत. धारावीतील गल्ल्यांमधील अनेक रस्त्यांवरील पेव्हर ब्लॉक उखडलेले आहेत. चौकामधील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. रस्त्यावर पाणी साचल्यास वाहतूक कोंडी होऊन त्याचा त्रास वाहनचालक व पादचाऱ्यांना होण्याची शक्‍यता आहे. वेळीच रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी धारावीत जोर धरीत आहे.\nKerala Floods : केरळमध्ये मदतीसाठी 38 हेलिकॉप्टर, शेकडो बोटी\nकोची : केरळमध्ये यंदाच्या शतकातील सर्वांत मोठी पूर आला असून, पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी तब्बल 38 हेलिकॉप्टर आणि शेकडो बोटी कार्यरत आहेत...\nMaratha Kranti Morcha : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री आंदोलन\nपुणे : मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे सोमवारपासून (ता.20) मराठा आरक्षणासाठी आणि विविध मागण्यांसाठी पुणे विभागीय आयुक्त...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nसंग्रामपूर : वाण धरण ६५ टक्के भरले\nसंग्रामपूर : सातपुडा पर्वतामधील तीन जिल्ह्यांसाठी जलसंजीवनी ठरलेले वाण धरण 65 टक्के भरले आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8C%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6/", "date_download": "2018-08-18T10:52:51Z", "digest": "sha1:IUW7P63NYPFFE5PWLRR555HNFKLPTRNP", "length": 10223, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मनिका-मौमा जोडीला महिला दुहेरीत रौप्य | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमनिका-मौमा जोडीला महिला दुहेरीत रौप्य\nराष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धा\nगोल्ड कोस्ट – अव्वल महिला खेळाडू मनिका बात्रा आणि अनुभवी मौमा दास या जोडीने राष्ट्रकुल टेबल टेनिसमधील महिला दुहेरीत रौप्यपदक पटकावून संस्मरणीय कामगिरी केली. मनिका-मौमा जोडीला अंतिम फेरीत फेंग तियानवेई आणि यु मेंगयु या सिंगापूरच्या गतविजेत्या जोडीकडून 5-11, 4-11, 5-11 असा पराभव पत्करावा लागला. महिला दुहेरीत भारताचे हे पहिलेवहिले रौप्यपदक ठरले. गेल्या चारही स्पर्धांमध्ये या प्रकारांतील भारताची सर्वोत्तम कामगिरी कांस्यपदकाची होती.\nमनिका बात्रा व मौमा दास या जोडीने त्याआधी इंग्लंडच्या जोडीवर 12-14, 11-3, 11-7, 11-6 अशी मात करताना उपान्त्य फेरी गाठली होती. कांस्यपदकाच्या लढतीत सुतीर्था मुखर्जी व पूजा सहस्रबुद्धे या भारतीय जोडीला यिंग हो आणि केरेन लिन या मलेशियाच्या जोडीकडून 13-15, 7-11, 11-8, 7-11 असा पराभव पत्करावा लागला. सुतीर्था-पूजा जोडीने त्याआधी कॅनडाच्या जोडीला 11-6, 11-7, 14-12 असे पराभूत करीत उपान्त्य फेरीत धडक मारली होती.\nमनिका बात्राने याआधीच महिलांच्या एकेरीत उपान्त्य फेरीत धडक मारली आहे. तसेच शरथ कमल व जी. साथियन या जोडीने येऊ एन पॅंग व शाव फेंग पोह या जोडीवर 7-11, 11-5, 11-1, 11-3 अशी मात करताना पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत स्‌.थान मिळविले. त्यांच्यासमोर सुवर्णपदकासाठी पॉल ड्रिंकहॉल व लियाम पिचफोर्ड या इंग्लंडच्या जोडीचे आव्हान आहे.\nशरथ कमल व मौमा दास जोडीने झेन वांग व मो झांग या जोडीला 11-9, 11-9, 5-11, 11-5 असे पराभूत करीत मिश्र दुहेरीच्या उपान्त्य फेरीत धडक मारली. तसेच मनिका बात्रा व जी. साथियन या जोडीने शु जिए पॅंग व यिहान झोऊ या सिंगापूरच्या जोडीचा 11-6, 12-10, 14-12 असा पराभव करीत उपान्त्य फेरीत आगेकूच केली.\nपुरुष एकेरीत शरथ कमलने इंग्लंडच्या लियाम पिचफोर्डवर 9-11, 13-11, 10-12, 11-9, 11-7 अशी मात करताना पुरुष एकेरीची उपान्त्य पेरी गाटली. शरथने त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या हेमिंग हु याला 11-8, 12-10, 8-11, 11-6, 11-5 असे पराभूत केले होते. मात्र हरमीत देसाईला नायजेरियाच्या क्‍वाद्री अरुनाकडून 9-11, 8-11, 9-11, 8-11 असा पराभव पत्करावा लागला. तसेच साथियनला इंग्लंडच्या सॅम्युएल वॉकरने 11-8, 11-8, 13-11, 17-15 असे पराभूत केले.\nमनिका बात्राने सिंगापूरच्या यिहान झोऊचे आव्हान 11-5, 11-6, 11-2, 6-11, 11-9 असे मोडून काढताना उपान्त्य पेरी गाठली. परंतु मौमा दासला सिंगापूरच्या यु मेंगयुकडून 13-15, 7-11, 5-11, 11-7, 5-11 असा पराभव पत्करावा लागला. तसेच उपान्त्यपूर्व फेरीतील अन्य सामन्यांत इंग्लंडच्या केली सिबलीने मधुरिका पाटकरला 11-9, 11-8, 2-11, 11-3, 8-11, 11-6 असे पराभूत केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा; पुरुष हॉकी संघाचा न्यूझीलंडकडून पराभव\nNext articleसिंधू, सायना, श्रीकांत, प्रणय उपान्त्य फेरीत\nनाणेफेक जिंकून इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय, भारतीय संघात मोठे बदल\nआशियाई क्रीडास्पर्धेचा आजपासून थरार \nदोन्ही संघासाठी संघनिवडच मोठी कसोटी\nआशियाई स्पर्धेतील यश विश्‍वचषकासाठी महत्त्वाचे- हरेंद्र सिंग\nसुवर्णपदकावर भारताचाच दावा – पी. आर. श्रीजेश\nआशियाई क्रीडा स्पर्धेतून लिअँडर पेसच्या माघारीने भारताला धक्‍का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/600652", "date_download": "2018-08-18T10:27:08Z", "digest": "sha1:2PJE5WFKVGQGFU4667Y4GHN72GAWAXJT", "length": 6613, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "तेलगू देसम केंद्र सरकारविरूद्ध पुन्हा अविश्वास ठराव आणणार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » तेलगू देसम केंद्र सरकारविरूद्ध पुन्हा अविश्वास ठराव आणणार\nतेलगू देसम केंद्र सरकारविरूद्ध पुन्हा अविश्वास ठराव आणणार\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू एकेकाळी भारतीय जनता पार्टीचे दक्षिण भारतातील महत्त्वाचे साथीदार होते. मात्र आंध्र प्रदेशाला विशेष दर्जा देण्याच्या त्यांच्या मागणीवरून भाजपा व त्यांच्या पक्षामध्ये वितुष्ट आले. आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये नायडू यांचा पक्ष केंद्र सरकाविरोधात पुन्हा अविश्वासदर्शक ठराव आणणार आहे.\n2014 साली आंध्र प्रदेशातून तेलंगण हे वेगळे करुन नवे राज्य तयार करण्यात आल्यानंतर आंध्र प्रदेशने आपल्याला विशेष दर्जा द्यावा अशी मागणी लावून धरली आहे. आंध्र प्रदेशाला विशेष दर्जा देण्याचे आश्वासन मिळाले होते असा दावा चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. मात्र भाजपाने असे कोणतेही आश्वासन दिले नव्हते असे सांगत त्यांचा दावा फेटाळला आहे. यावषी अर्थसंकल्पीय अधिवेशनातही तेलगू देसमने केंद्र सरकारविरोधात अविश्वास दर्शक ठराव मांडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वारंवार लोकसभा तहकूब झाल्यामुळे त्यावर पुढे कोणतीही कार्यवाही झाली नाही. मार्च महिन्यात चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या मंत्र्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचे आदेश दिले होते. 2019 साली आंध्र प्रदेशात नायडू यांना आंध्र प्रदेशात निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. तेलगू देसम पक्ष केंद्र सरकारकडून आपल्या राज्याला विशेष दर्जा मिळवण्यात अपयशी ठरला अशी टीका वायएसआर काँग्रेसचे नेते एस. जगनमोहन रेड्डी यांनी वारंवार केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आंध्रातील आपले स्थान कायम ठेवण्यासाठी नायडू यांना धडपड करावी लागणार आहे.\nमतदारांची नावे गायब झाल्याने चौकशीचे आदेश\nनिवडणूक आयोग आज आव्हान स्वीकारणार\nशहिदांच्या कुटुंबीयांना एक कोटींचा निधी\nगुगलने केली ‘प्ले स्टोअर’ची सफाई\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/bhiwandi-municipal-election-43569", "date_download": "2018-08-18T10:52:22Z", "digest": "sha1:L3R2H3V2G3C6TCQYIEABR5IHHI6DX2WK", "length": 14676, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bhiwandi municipal election उमेदवारांवर आयोगाची करडी नजर | eSakal", "raw_content": "\nउमेदवारांवर आयोगाची करडी नजर\nशनिवार, 6 मे 2017\nभिवंडी - भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी व निवडणुकीत होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी राज्य निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. आयोगाच्या आदेशावरून पालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी चार विशेष पथके स्थापन केली आहेत. या पथकांद्वारे उमेदवारांवर नजर ठेवून कायद्यांचे व आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश नुकत्याच झालेल्या प्रशिक्षण शिबिरात देण्यात आल्याने कर्मचारी व अधिकारी सतर्क झाले असून, त्यांनी विविध प्रभागांत जाऊन उमेदवारांनी आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.\nभिवंडी - भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी व निवडणुकीत होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी राज्य निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. आयोगाच्या आदेशावरून पालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी चार विशेष पथके स्थापन केली आहेत. या पथकांद्वारे उमेदवारांवर नजर ठेवून कायद्यांचे व आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश नुकत्याच झालेल्या प्रशिक्षण शिबिरात देण्यात आल्याने कर्मचारी व अधिकारी सतर्क झाले असून, त्यांनी विविध प्रभागांत जाऊन उमेदवारांनी आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उमेदवारांनी प्रभागात प्रचार सुरू केल्याने पालिकेच्या पथकाने त्यांचे व्हिडीओ शूटिंग व कॅमेरा फोटो काढून नोंद सुरू केली आहे.\nभिवंडी पालिकेच्या निवडणुकीचे कामकाज सुरळीत व्हावे, आचारसंहिता व कायद्याची अंमलबजावणी योग्यरीत्या व्हावी यासाठी पालिका सभागृहात निवडणूक अधिकारी, कर्मचारी वर्गाची विशेष बैठक झाली. उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता पथकाचे शिवाजी पाटील, नंदकुमार कोष्टी, उपायुक्त विनोद शिंगटे आदी अधिकारी या वेळी उपस्थित होते. मतदारांना प्रलोभन दाखवणे, विनापरवाना बॅनर, फलक, मंडप व स्टेज वापरणे, प्रचारसभा व त्यातील परवानगी असलेली वाहने, उमेदवारांनी खर्चातून दाखविलेल्या जाहिराती, आर्थिक व्यवहार, मद्याची गैरप्रकारे ने-आण करणे व निवडणूक काळात होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी पालिकेने शहरातील नादीनाक, साईबाबा नाका, अंजूरफाटा, चेक पोस्ट कारिवली, मिल्लतनगर, पोगाव या ठिकाणी चेक पोस्ट निर्माण करून कर्मचाऱ्यांचे पथक तसेच उमेदवारांवर नजर ठेवण्यासाठी तीन पथके नेमली आहेत. या पथकांमध्ये पालिका कर्मचारी, पोलिस, सेल्स टॅक्‍स, इन्कम टॅक्‍स, एक्‍साईज, आरटीओ आयडी अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे.\nनागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक\nनागरिकांनी तक्रार दाखल करण्यासाठी 18002331102 हा टोल फ्री क्रमांक वापरावा, असे आवाहन आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले. आचारसंहितेच्या काळात आतापर्यंत 288 पोस्टर्स, 531 बॅनर्स व 169 झेंडे काढण्यात आले आहेत; तर आचारसंहितेचा भंग करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली.\nघरकामगार, बांधकाम मजूर महिलांची उपेक्षाच\nजळगाव : दिवसरात्र काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, पण डोक्‍यावर हक्काचं छत नाही...सतत कष्ट करूनही पदरी काहीच न पडल्यामुळे अनेकदा उपवास...\nडिजिटायझेशन'ने दुर्मिळ ग्रंथही चिरकाल \nजळगाव ः पुस्तकांचा खजिना सांभाळणाऱ्या अनेक वाचनालयांना शतकोत्तरी परंपरा लाभलेली आहे. परंतु काळानुरूप ग्रंथालयांनी तंत्रज्ञानाशी जुळवून, त्या दिशेने...\nजिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांची मुलाखत\nलोणी काळभोर - माथाडी माफिया, लॅन्ड माफिया, सॅऩ्ड माफिया, खाजगी सावकारांच्या बरोबर कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहचवणाऱ्यांना वठणीवर आनण्यासाठी तडीपारी...\nइस्लामाबाद : 'पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ'चे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांनी आज (शनिवार) पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ...\nविद्यार्थ्यांची जबाबदारी शिक्षकांबरोबर पालकांचीही - प्राध्यापक पंकज गावडे\nनवी सांगवी (पुणे) - \" चारित्र्यवान साने गुरूजींचे जीवन हे त्यांच्या शिक्षकांबरोबर त्यांची वात्सल्यसिंधु आईच्या संस्कारामुळे घडले, त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/wari/pune-news-mobile-tower-palkhi-50507", "date_download": "2018-08-18T10:52:04Z", "digest": "sha1:CW6QY6D4MTHDMW6QMSZONNUHQDEDKAZE", "length": 13914, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news mobile tower palkhi दोन्ही पालख्यांसोबत \"मोबाईल टॉवर' | eSakal", "raw_content": "\nदोन्ही पालख्यांसोबत \"मोबाईल टॉवर'\nसोमवार, 5 जून 2017\nपुणे - मोबाईल सेवा पुरविणाऱ्या सर्व कंपन्यांचे \"मोबाईल टॉवर' दोन्ही पालख्यांसोबत दिले जाणार आहेत. तसेच आषाढी वारीसाठी पालखीतळ, रिंगण मैदाने आणि पालखी मार्गांवरील विकासकामे अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून शनिवारी देण्यात आली.\nपुणे - मोबाईल सेवा पुरविणाऱ्या सर्व कंपन्यांचे \"मोबाईल टॉवर' दोन्ही पालख्यांसोबत दिले जाणार आहेत. तसेच आषाढी वारीसाठी पालखीतळ, रिंगण मैदाने आणि पालखी मार्गांवरील विकासकामे अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून शनिवारी देण्यात आली.\nपंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीची आढावा बैठक पुणे आणि सोलापूर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवन येथे पार पडली. या वेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पालखी तयारीचा आढावा घेतला. या वेळी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी पालखीतळ, रिंगण मैदाने आणि मार्गांवरील कामांची माहिती दिली.\nजिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले, \"\"संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांसमवेत \"मोबाईल टॉवर' असलेले स्वतंत्र ट्रक पंढरपूरपर्यंत जाणार आहेत. पिण्याच्या पाण्याचे ट्रक, फिरती शौचालये, रुग्णवाहिका, फिरते आरोग्य केंद्रदेखील तैनात केले जाणार आहे. पालखी मार्गांवर वाटल्या जाणाऱ्या पाण्याचे निर्जंतुकीकरण, अन्न नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे. कचऱ्याची विल्हेवाटदेखील शास्त्रोक्त पद्धतीने केली जाणार आहे. पालखीदरम्यान फटाकेबंदी असणार आहे. तसेच पालखी मार्गावरील मांसाहारी हॉटेल, कत्तलखाने, मासळी बाजार आणि मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.''\nतसेच साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी पालखी मार्गांची दुरुस्ती, पायाभूत सुविधांच्या झालेल्या कामांची माहिती दिली.\nपुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीदेखील महापालिका हद्दीतून पालखी सोहळ्यासाठीच्या पूर्वतयारीचा आढावा सादर केला.\nअतिक्रमणे काढून टाकण्याच्या सूचना\nपंढरपूर आषाढी वारीमध्ये सुमारे दहा लाख वारकरी सहभागी होणार आहेत. त्यामुळे गर्दीमुळे वाहतूक कोंडी, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पालखी प्रस्थानापूर्वी देहू आणि आळंदी पालखी मार्गांवरील अतिक्रमणे काढून टाकण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी या वेळी पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.\nKerala Floods : केरळमध्ये मदतीसाठी 38 हेलिकॉप्टर, शेकडो बोटी\nकोची : केरळमध्ये यंदाच्या शतकातील सर्वांत मोठी पूर आला असून, पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी तब्बल 38 हेलिकॉप्टर आणि शेकडो बोटी कार्यरत आहेत...\nMaratha Kranti Morcha : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री आंदोलन\nपुणे : मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे सोमवारपासून (ता.20) मराठा आरक्षणासाठी आणि विविध मागण्यांसाठी पुणे विभागीय आयुक्त...\nएमआयएम नगरसेवक मतीन यांना अटक\nऔरंगाबाद- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला नकार देणारे औरंगाबादमधील एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना आज अटक करण्यात...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B2%E0%A5%8B/", "date_download": "2018-08-18T10:55:09Z", "digest": "sha1:G7M4PC3FAJWUEMHIXUUTG2P4EYQ5ZGQN", "length": 16475, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "आणीबाणी म्हणजे भारतीय लोकशाहीला बसलेला कलंक – डॉ. प्रतिभा लोखंडे - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे…\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची…\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Pimpri आणीबाणी म्हणजे भारतीय लोकशाहीला बसलेला कलंक – डॉ. प्रतिभा लोखंडे\nआणीबाणी म्हणजे भारतीय लोकशाहीला बसलेला कलंक – डॉ. प्रतिभा लोखंडे\nपिंपरी, दि. २८ (पीसीबी) – आणीबाणीने सर्वसामान्य नागरीकांची मुस्काटदाबी केली. आणीबाणीचा तो काळ म्हणजे भारतीय लोकशाहीला बसलेला कलंक असल्याचे मत भाजपच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. प्रतिभा लोखंडे यांनी व्यक्त केले.\nपिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने आणीबाणी एक पर्व सन्मान सोहळ्याचे नुकतेच आयोजन केले होते. त्यामध्ये प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी राज्य लेखा समिती अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, प्रदेश कार्यकारणी चिटणीस उमाताई खापरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत वाणी, माजी नगरसेवक मधू जोशी, नगरसेवक सुरेश भोईर, नामदेव ढाके, राजेंद्र गावडे, विजय सिनकर, रामकृष्ण राणे, मधुकर बच्चे, भारती विनोदे, व्यापारी आघाडी शहराध्यक्ष राजेंद्र चिंचवडे, शहर प्रसिद्धीप्रमुख संजीवनी पांडे, शेखर चिंचवडे, रवी देशपांडे, अलका पांडे, शिवाजी शेडगे, पंजाब मोंढे, राजेंद्र सराफ, दिलीप गडदे, लक्ष्मण प्रधान, भाजयुमोचे सचिन राऊत, स्वप्नील शेडगे, स्वप्नील डांगे आदी उपस्थित होते.\nआसाराम कसबे यांच्या आणीबाणीवरील पोवाड्याने कार्यक्रमाला सुरवात झाली. वसंत वाणी, शरद खांबे, अॅड. सचिन पटवर्धन यांनी आणीबाणीतील काळ्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन प्रभाग स्वीकृत सदस्य बिभीषण चौधरी यांनी केले. प्रदिप सायकर यांनी आभार मानले.\nया कार्यक्रमासाठी धनंजय शाळिग्राम, अजित कुलथे, राहुल मोकाशी यांनी परिश्रम घेतले.\nPrevious articleयुजीसी बंद करण्याची प्रकाश जावडेकर यांची घोषणा\nNext articleबारामतीत तरुणीचे अपहरण करुन बलात्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा ऐवज जप्त\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात वर्ग\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nपिंपरी रेल्वेस्टेशन जवळ महिलेकडून ९ ग्रॅम बाऊनशुगर जप्त\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nधनगर आरक्षणासाठी पिंपरी-चिंचवडमधील समाजबांधवांचे आमदार लक्ष्मण जगताप यांना निवेदन\nएका वर्षात ७० लाख रोजगाराची निर्मिती\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा...\n‘माणसं आडवा आणि त्यांची जिरवा’, यामुळे जलसंधारणाची कामे रखडली – मुख्यमंत्री\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nसततच्या पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील जनजीवन विस्कळीत\nनिगडीत ज्ञानप्रबोधिनीच्या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-18T10:58:23Z", "digest": "sha1:4TM2JFRSAQLXMY6G5TI37JBN6LQ4QQAK", "length": 15819, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "घटनादुरुस्तीतून समाजाला खुश करण्याचा प्रश्नच येत नाही – शरद पवार - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे…\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची…\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Maharashtra घटनादुरुस्तीतून समाजाला खुश करण्याचा प्रश्नच येत नाही – शरद पवार\nघटनादुरुस्तीतून समाजाला खुश करण्याचा प्रश्नच येत नाही – शरद पवार\nमुंबई, दि. २९ (पीसीबी) – घटनादुरुस्तीतून समाजाला खुश करण्याचा प्रश्नच येत नसून मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती करा, त्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र आणण्याची जबाबदारी मी घेईन, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. घटना बदल करण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे. म्हणून संसदेत जाऊन यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही पवार म्हणाले.\nघटनादुरुस्ती नेमकी कशी होईल, हे पवारांनी स्पष्ट करावे, असे भारीपचे प्रकाश आंबेडकर नाशिकमध्ये म्हणाले होते. घटनादुरुस्ती कशी होईल हे पवारांनी न सांगितल्यास केवळ मराठा समाजाला खुश करण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केले हेते, असा त्याचा अर्थ निघेल, असे आंबेडकर म्हणाले होते. यावर पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली.\nपवार म्हणाले की, आम्ही आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, हे गडकरी विसरले. महाराष्ट्रात आघाडी सरकार असताना निर्णय राबवला, आरक्षण दिले. लोकांना नोकऱ्या मिळाल्या. पण काही जण न्यायालयात गेले आणि निर्णयाला स्थगिती मिळाली. गडकरी हे उत्तम काम करतात याची मला कल्पना आहे आणि आनंद आहे. मात्र त्यांनी असे काही राजकीय विधान केले, तर ते अशोभनीय आहे, असे पवार म्हणाले.\nPrevious articleदेशाच्या प्रगतीमध्ये शेतकऱ्यांइतकेच उद्योगपतींचेही योगदान – पंतप्रधान मोदी\nNext article‘एआयएडीएमके’ पक्षाचे बंडखोर नेते दिनाकरन यांच्या कारवर बाँम्ब हल्ला\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घाेषणा\nहिम्मत होती तर एकेकाने यायचे होते मग दाखवले असते; औरंगाबादेतील एमआयएम नगरसेवकाचा माज\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nवाजपेयी जेव्हा विठ्ठलदर्शनासाठी पंढरपूरात आले होते\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमावळ येथील सोमाटणे फाट्याजवळ कारला भीषण अपघात; तीन गंभीर जखमी\nरिलायंस उद्योग समुहाचे चेअरमन अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A5%8D-%E0%A4%B2%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%97.html", "date_download": "2018-08-18T11:07:36Z", "digest": "sha1:OJEAQE7FMLSP3AZAKASHCFKVSZCTY7KH", "length": 22839, "nlines": 292, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | चीन करतोय् लष्कराची हेरगिरी", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » चीन करतोय् लष्कराची हेरगिरी\nचीन करतोय् लष्कराची हेरगिरी\nनवी दिल्ली, [८ मे] – सिंगापूरच्या एका कंपनीने मोठ्या प्रमाणावर चालणार्‍या सायबर हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, हे नेटवर्क चीनच्या इशार्‍यावर कार्यरत आहे.\nगेल्या १० वर्षांपासून आशियात सक्रिय असलेल्या या नेटवर्कच्या माध्यमातून भारतीय लष्कराची हेरगिरी करण्यात येत आहे. देशातील काही महत्त्वपूर्ण व्यक्ती आणि संस्थांच्या संगणक यंत्रणा या नेटवर्कच्या माध्यमातून हॅक केल्या जात असून त्या माध्यमातून हेरगिरी केली जाते. हा दावा करणारी कंपनी सिंगापूरची असून ‘फायर आय’ असे तिचे नाव आहे. कंपनीने या हेरगिरी नेटवर्कला ‘एपीटी ३०’ असे नाव दिले असून या नेटवर्कचे मुख्य लक्ष्य भारतीय सेना, भारताची हवाई आणि समुद्राची हद्द हे आहे.\nकंपनीने या नेटवर्कच्या कामाची पद्धतही उघडकीस आणली आहे. हे नेटवर्क युझर्सना प्रलोभने दाखविणारे डॉक्युमेंट्‌स मेल करते. त्यांनी ते डाऊनलोड केल्यानंतर त्यात आधीच असणारा व्हायरस सक्रिय होतो. हा व्हायरस आधी फीड केलेल्या प्रोग्रामनुसार, डेटा ट्रान्सफर करायला सुरुवात करतो. ही माहिती चीनमधील सर्व्हर्समध्ये जमा होतेे. या डॉक्युमेंटच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक कॉम्प्युटरला हा व्हायरस बाधित करतो.\nजी व्यक्ती किंवा संस्था रडारवर आहे, त्याचे क्षेत्र आणि आवड लक्षात घेऊन अशा फाईल्स तयार केल्या जातात. चीनच्या दक्षिण समुद्रातील भारतीय सैन्याच्या हालचाली, कोच्चीमध्ये भारतीय विमान उपक्रमांदरम्यान, भारत-चीन सीमेवरील घटना आणि भारत-नेपाळच्या संबंधांवर लक्ष ठेवण्यासाठी अशी हेरगिरी केली जात असल्याचे ‘फायर आय’ने म्हटले आहे. कंपनीच्या अहवालानुसार, यात भारतीय टेलिकम्युनिकेशन कंपनीलाही लक्ष्य करण्यात आले आहे. या हेरगिरीचा संबंध भूतानसोबतही असल्याचे संबंधित अहवालात म्हटले आहे.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1719 of 2453 articles)\nजीतनराम मांझी यांचा नवा पक्ष स्थापन\nपाटणा, [८ मे] - जदयुचे निलंबित नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी आज शुक्रवारी स्वत:चा नवा राजकीय पक्ष ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%AD-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AF/", "date_download": "2018-08-18T10:52:23Z", "digest": "sha1:O6TBHF4UUB3LTWNFFA3LYMEMTQPV2BU5", "length": 11474, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संस्मरणीय ठरली सौरभ राव यांची कारकीर्द | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसंस्मरणीय ठरली सौरभ राव यांची कारकीर्द\nराव यांनी फेब्रुवारी 2014 मध्ये जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर लगेचच दोन महिन्यांनी लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकीत मतदार यादीतून परस्पर नावे वगळल्याच्या अनेक तक्रारी झाल्या. तसेच आंदोलनही करण्यात आले. याविषयी उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली होती. यानंतर जिल्हाधिकारी राव यांनी जिल्ह्यात मतदार यादी अद्यायावत करण्याची मोहीम हाती घेतली. विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार यादीत नाव नसल्याची एकही तक्रार जिल्हा प्रशासनाकडे आली नाही.\nजिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत : अनेक प्रकल्प मार्गी\nपुणे-पुनर्वसनाचे आदर्श मॉडेल ठरावे असे माळीण गावचे पुनर्वसन…पुरंदर विमानतळासाठी जागा निश्‍चित ते संरक्षण खात्याची मान्यता…जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत केलेली कामे…मतदार याद्या अद्ययावत…कॉर्पोरेट क्षेत्रासारखी देखणी जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत असे प्रकल्प मावळते जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळात मार्गी लागले.\nमागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यात नवे विमानतळ होणार असल्याची फक्त चर्चाच होती. राव यांच्या कार्यकाळात नविन विमानतळासाठी पुरंदर येथील जागेची निवड करण्यात आली. त्यानंतर विमानतळासाठी प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले. विविध संस्थांनी पुरंदर येथील जागा विमानतळासाठी योग्य असल्याचा अहवाल दिला. त्यानंतर संरक्षण विभागाकडून पुरंदर विमानतळास मान्यता देण्यात उशीर लावला. सुमारे आठ महिन्याच्या पाठपुराव्यानंतर संरक्षण विभागाने पुरंदर विमानतळाला ग्रीन सिग्नल दिला. संरक्षण विभागाकडून मान्यता मिळण्यासाठी जिल्हाधिकारी राव यांनी पाठपुरावा केला. पालखी मार्गाचे विस्तारीकरण, भीमाशंकर देवस्थानसाठी केलेल्या आराखड्यास शासनाची मान्यता मिळाली. आदी कामे जिल्हाधिकारी राव यांच्या कार्यकाळात पूर्ण झाली.\nमाळीण गावचे आदर्श पुनर्वसन\nजुलै 2014 मध्ये आंबेगाव तालुक्‍यातील माळीण गावावर भूस्खलनामुळे डोंगरकडा कोसळला. त्यामध्ये 151 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमध्ये संपूर्ण गावाचे अस्तित्वच पुसून गेले. त्यानंतर प्रशासनाकडून नवीन जागेचा शोध घेऊन माळीण जवळील आमडे गावातल्या 8 एकर जागेवर या नागरिकांचे पुनर्वसन केले. या ठिकाणी सुमारे 67 घरे बांधण्यात आली. या घरांबरोबरच तलाठी कार्यालय, बसथांबा, रस्ते, शाळा आदी सुविधा ग्रामस्थांना देण्यात आल्या. या गावचे पुनर्वसन जिल्हाधिकारी राव यांनी उत्तमरित्या केले. हे काम आदर्श ठरले.\nजलयुक्‍त शिवाय अभियान प्रभावी\nब्रिटीशकालीन जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत अपुरी पडत होती. त्यामुळे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या नवीन इमारतीचे भूमिपूजन आणि इमारतीचे उद्‌घाटनही राव यांनी कार्यकाळात झाले. जलयुक्त शिवार योजनेमध्ये राव यांनी चांगले काम केले. राज्य शासनाने दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा जास्त गावांमध्ये जलयुक्तची कामे झाली. मागील वर्षी पुणे जिल्ह्याला जलयुक्त शिवार योजनेमध्ये राज्यात दुसरा क्रमांक मिळाला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे मनपा आयुक्तपदी राव, तर जिल्हाधिकारीपदी राम\nNext articleकोल्हापूरची विमानसेवा आजपासून सुरु होणार\nसारथी उपक्रमातून 5 लाख लोकांचे शंका निरसन\nपुणे – दोनशेहून अधिक जणांकडून दावे दाखल\n“भुक मुक्त’ पुण्यासाठी स्मार्ट सिटीचा पुढाकार\nकचरा प्रकल्पांची क्षमता वाढवा\n24 तासांमध्ये मिळणार वीजग्राहकांना संपूर्ण माहिती\nअजित पवार यांनी घेतला जिल्हा परिषदेच्या कारभाराचा आढावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-18T10:56:23Z", "digest": "sha1:YQVAY7VPBMP64EUG4NKVP2JVZPAAP6YE", "length": 15995, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "भारतात गरिबीच्या प्रमाणात झपाट्याने घसरण - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे…\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची…\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Desh भारतात गरिबीच्या प्रमाणात झपाट्याने घसरण\nभारतात गरिबीच्या प्रमाणात झपाट्याने घसरण\nनवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – भारतात गरिबीच्या प्रमाणात झपाट्याने घसरण होत आहे. दर ४४ मिनिटाला काही भारतीय दारिद्रय रेषेतून बाहेर येत आहेत, असे एका पाहणीतून समोर आले आहे. भारतातील गरिबीचे प्रमाण वेगाने कमी होत आहे. त्यामुळे भारत आता सर्वाधिक गरिबांची लोकसंख्या असलेला देश राहणार नाही, असे या सर्व्हेक्षणात नमूद करण्यात आले आहे.\nब्रुकिंग्सच्या ‘फ्युचर डेव्हल्पमेंट ब्लॉग’मध्ये एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार भारतात गरिबी कमी होत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भारत लवकरच सर्वाधिक गरिबांची लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येईल. आतापर्यंत भारत या यादीत पहिल्या क्रमांकावर होता. मात्र, भारतातील गरिबी घटण्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या भारत या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून नायजेरियाने पहिल्या स्थानावर आहे. तर डेमोक्रॅटीक रिपब्लिक कांगो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.\nदैनंदिन गरजा भागविण्यासाठी लोकांना दिवसाला १२५ रुपये लागतात. मात्र, ज्या लोकांना १२५ रूपये मिळत नाहीत, ते लोक दारिद्र्य रेषेत येतात, असे या अहवालात म्हटले आहे. या अभ्यास अहवालानुसार २०२२ पर्यंत ३ टक्क्यापेक्षा कमी भारतीय गरीब असतील. तर २०३० पर्यंत भारतात अती दारिद्र्य रेषेखाली एकही व्यक्ती राहणार नाही.\nPrevious articleनिगडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ९ वर्षीय मुलाचा मृत्यू\nNext articleसांगवी परिसरात चार ठिकाणी वटपौर्णिमेदिवशीच महिलांच्या गळ्यातील सोने चोरट्यांनी पळवले\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nवाजपेयींच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनाला दिग्गजांची रीघ; फडणवीस यांच्याकडून पार्थिवाचे अत्यंदर्शन\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nभाजपला पराभव दिसू लागल्याने एकत्रित निवडणुकांचा घाट – राज ठाकरे\nशरद पवारांचे डोके ठिकाणावर आहे का \nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\n‘त्या’ फेक ऑडिओ क्लिपमुळे शहीद मेजर कौस्तुभ यांच्या कुटुंबियांना मनस्ताप\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n‘वन नेशन, वन इलेक्शन’ ला काँग्रेसचा कडाडून विरोध\nमनुष्याची हत्या करेल असे कोणतेही तंत्र विकसित करणार नाही – गुगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-18T10:56:37Z", "digest": "sha1:66VS72EH3O22QGMXQ2UJJNUGYQE73GID", "length": 16477, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "सुनील तटकरे यांच्यावरील आरोपाप्रकरणी चंद्रकांत पाटलांची दिलगिरी - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे…\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची…\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Maharashtra सुनील तटकरे यांच्यावरील आरोपाप्रकरणी चंद्रकांत पाटलांची दिलगिरी\nसुनील तटकरे यांच्यावरील आरोपाप्रकरणी चंद्रकांत पाटलांची दिलगिरी\nनागपूर, दि. १६ (पीसीबी) – इयत्ता सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात सात पाने गुजराती भाषेत छापल्यावरून विधान परिषदेत गदारोळ उडाला होता. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांना ‘तुम्हीच ही पाने जोडली असतील’, असा आरोप केला होता. या प्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी आज (सोमवारी) सभागृहात दिलगिरी व्यक्त केली.\nइयत्ता सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात सात पाने गुजरातीत भाषेत छापल्यावरून विरोधकांनी शुक्रवार (दि. १३) गोंधळ घातला. दरम्यान यावर सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सुनील तटकरेंवर “तुम्हीच जोडून आणली ही पाने’, असा आरोप केला. त्यावर तटकरे यांनी “हे मी छापून आणले हे तुम्ही सिद्ध केले. तर येथेच विष घेऊन आत्महत्या करीन’, असा इशारा दिला होता.\nयावर आज (सोमवारी) शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी निवेदन केले. इयत्ता सहावीच्या मराठीच्या ११ लाख ५० हजार प्रती छापण्यात आल्या. ११ मुद्रकांना हे काम सोपविले होते. त्यापैकी १ लाख प्रतींच्या छपाईचे व बांधणीचे काम गुजरातमधील श्लोक प्रिंट सिटी प्रिंटर्स यांना दिले होते. त्यात बाईंडीग करताना मराठी भूगोलाच्या पुस्तकात गुजराती पुस्तकाची पाने जोडण्यात आली. ही सदोष बांधणीची पुस्तके बालभारतीची सर्व विभागीय भांडारे तसेच मंडळाच्या नोंदणीकृत वितरकाकडून बदलवून देण्यात येईल, असे विनोद तावडे यांनी सांगितले.\nPrevious articleकॅन्सरग्रस्त पतीसोबत शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने पत्नीची हत्या\nNext articleमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर; विकासकामांचे भूमीपूजन आणि कार्यकर्ता मेळावा होणार\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घाेषणा\nहिम्मत होती तर एकेकाने यायचे होते मग दाखवले असते; औरंगाबादेतील एमआयएम नगरसेवकाचा माज\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nकायद्यात दुरूस्ती केल्यास लोकसभा, विधानसभा एकत्रित निवडणुका शक्य – मुख्य निवडणूक...\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन\n‘तुझे तोंड बंद कर अन्यथा कायमस्वरुपी तुझे तोंड बंद करु’ शेहला...\nवैभव राऊतच्या घराची पुन्हा झडती; इनोव्हा कार जप्त\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nएकनाथ खडसेंना पंतप्रधानही व्हावेसे वाटत असावे; गिरीश महाजनांचा उपरोधिक टोला\nदाभोलकर-पानसरे हत्येशी संबंध आहे का याची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/596201", "date_download": "2018-08-18T10:24:53Z", "digest": "sha1:LUBM7A4JVDI2HJOKYHNVCWNO56HTXQXP", "length": 5243, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मारुतीची ७ सीटर 'वॅगन आर' लवकरच होणार लॉन्च - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Automobiles » मारुतीची ७ सीटर ‘वॅगन आर’ लवकरच होणार लॉन्च\nमारुतीची ७ सीटर ‘वॅगन आर’ लवकरच होणार लॉन्च\nऑनलाईन टीम / मुंबई :\nमारुती सुझुकीची सर्वात लोकप्रिय ‘वॅगन-आर’ नव्या स्वरुपात भारतात दाखल होतेय. नवी ‘वॅगन-आर’ जुन्या वॅगन-आरच्या मॉडेलपासून बरीच वेगळी आहे. यामध्ये अगोदरपेक्षा जास्त स्पेस आणि दमदार इंजिन असेल.\n‘वॅगन-आर’चं ७ सीटर मॉडेल यावर्षी सणासुदीच्या काळात म्हणजेच ऑगस्टमध्ये लॉन्च केलं जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. सध्याच्या ‘वॅगन-आर’मध्ये केवळ ५ जणांना बसण्यासाठी व्यवस्था आहे. नव्या ‘वॅगन-आर’मध्ये १.२ लीटरचं ३ सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन ८४ bhpच्या पॉवरसोबत ११५nm टॉर्क जनरेट करतं. ५ स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन (AMT) दोन्ही ऑप्शन्समध्ये ही कार बाजारात उपलब्ध असेल. कंपनी नव्या ‘वॅगन-आर’सोबत सीएनजी ऑप्शन देण्याचाही विचार करू शकते.\n‘वॅगन-आर’ ३ वेरिएंटमध्ये लॉन्च होऊ शकते. या कारचे तीन वेरिएंट R बेस, R टॉप आणि R सीएनजी असू शकतात.\nया कारची सुरुवातीची किंमत ५.२ लाख रुपये असू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये R बेसची एक्स शोरुम किंमत ५.२ लाख रुपये, R टॉपची ६.५ लाख आणि R सीएनजीची किंमत ६.३ लाख रुपये असू शकेल.\nHonda Mobilio चे प्रॉडक्शन बंद\n7 सेकंदात 200 किमीच्या वेगात धावणार ही इलेक्ट्रिक कार\n२०१७-१८ मध्ये या गाडीची झाली सर्वाधिक विक्री\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/rail-problem-nanded-limbagan-47474", "date_download": "2018-08-18T10:33:41Z", "digest": "sha1:U7SNIQLZCYH2HBW2L7I425VZEJPRWWV3", "length": 12270, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rail problem in Nanded-Limbagan नांदेड-लिंबगाव दरम्यान रेल्वे रुळात बिघाड | eSakal", "raw_content": "\nनांदेड-लिंबगाव दरम्यान रेल्वे रुळात बिघाड\nबुधवार, 24 मे 2017\nनांदेड - उमरी रेल्वे स्टेशनजवळ नुकताच दुचाकी रेल्वे रुळावर ठेवल्याने अपघात घडला होता. हे प्रकरण ताजे असतानाच सोमवारी (ता. २३) नांदेड - लिंबगाव स्थानक दरम्यान रेल्वे रुळावर एका ठिकाणी रुळात बिघाड झाल्याचे आढळून आले. यामुळे काही रेल्वे उशिराने धावल्या. रेल्वे विभागाने ताे बिघाड (फ्रॅक्चर) दुरुस्त करून गाड्यांची जाण्या - येण्याची व्यवस्था केली.\nनांदेड - उमरी रेल्वे स्टेशनजवळ नुकताच दुचाकी रेल्वे रुळावर ठेवल्याने अपघात घडला होता. हे प्रकरण ताजे असतानाच सोमवारी (ता. २३) नांदेड - लिंबगाव स्थानक दरम्यान रेल्वे रुळावर एका ठिकाणी रुळात बिघाड झाल्याचे आढळून आले. यामुळे काही रेल्वे उशिराने धावल्या. रेल्वे विभागाने ताे बिघाड (फ्रॅक्चर) दुरुस्त करून गाड्यांची जाण्या - येण्याची व्यवस्था केली.\nमंगळवारी (ता. २३) सकाळी नऊच्या नंतर काही वेळाने लिंबगाव ते नांदेड दरम्यान रेल्वे रुळावर एका जोडणीच्या ठिकाणी बिघाड झाल्याचे रेल्वे ट्रॅकमनला दिसले. या बाबत त्याने त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले. त्यानंतर त्वरित तांत्रिक अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी पोचले. त्या फ्रॅक्चरची दुरुस्ती करण्यात आली. या प्रकाराने नांदेड येथून सुटणाऱ्या सचखंड आणि तपोवन उशिरा सोडण्यात आल्या. झालेला फ्रॅक्चर प्रकार घातपात आहे की नियमित जाणाऱ्या येणाऱ्या प्रभावाने घडलेला प्रकार आहे हे सांगण्यास अद्याप तरी कोणीही तयार नाही. या प्रकरणी रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वाढत्या तापमानामुळे रेल्वे रुळात नेहमीच बिघाड होत असताे. आमचे ट्रॅकमन यावर नियंत्रण ठेवून असतात. लिंबगावजवळ झालेला हा प्रकार तेवढा गंभीर नव्हता. दुरुस्तीसाठी केवळ अर्धा तास लागला. बाकी रेल्वेची ये -जा सुरळीत सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.\nMaratha Kranti Morcha : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री आंदोलन\nपुणे : मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे सोमवारपासून (ता.20) मराठा आरक्षणासाठी आणि विविध मागण्यांसाठी पुणे विभागीय आयुक्त...\nटाकवे बुद्रुक - सावित्रींच्या लेकींना दुस-या टप्प्यात पंधरा सायकलींचे वाटप\nटाकवे बुद्रुक - आंदर मावळाच्या मिंडेवाडी तील ठाकरवस्ती, चावसरवस्ती, जाधववाडीतून पायपीट करीत येणा-या विद्यार्थ्यांसह सावित्रींच्या लेकींना दुस-या...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81.%E0%A4%B2._%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87_%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8,_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2018-08-18T09:59:51Z", "digest": "sha1:6PV25ITRKGJNXDGZKFXVYV6SNMEFIGCA", "length": 24540, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पु.ल. देशपांडे उद्यान, पुणे - विकिपीडिया", "raw_content": "पु.ल. देशपांडे उद्यान, पुणे\nपु.ल. देशपांडे उद्यान पुण्यातील हे सिंहगड रोड वर असलेले एक उद्यान आहे. याची रचना जपानी उद्यानपद्धतीची आहे.\nप्रचलित सर्व प्रकारच्या उद्यान शैलीत जपानी उद्यानशैली ही सुंदर आणि अति विकसित उद्यान शैली आहे, असे मानले जाते. जपानी उद्याने त्यांच्या अभिरुचीपूर्ण नैसर्गिकता यासाठी जगामध्ये प्रसिद्ध आहेत. पु.ल. देशपांडे उद्यान (याचे जुने नाव \"पुणे ओकोयामा मैत्री उद्यान\" असे होते.) हे जपान मधील ओकोयामा शहरातील ३०० वर्षापूर्वीच्या प्रसिद्ध कोराक्वेन उद्यानाच्या धर्तीवर विकसित केलेले भारतातील एक उद्यान आहे.\nपु.ल. देशपांडे उद्यान एकूण १० एकर परिसरामध्ये विस्तारले आहे. वर्षभरातल्या बदलत्या ऋतूंतील निसर्ग सौंदर्याचे स्वरूप लोकांना पहावयास मिळावे अशी या उद्यानाची रचना करण्यात आली आहे या उद्यानात फिरताना हिरवळ, तळी, पाण्याचे झरे, टेकड्या या सर्वांचा अनुभव घेता येतो. कॉफी, भात आणि अशा विविध वैशिट्यपूर्ण वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. या शिवाय तुळस आणि त्याच्या सारख्या अनेक औषधी वनस्पती येथे आहेत. गुलाब, तगरी पासून विविध शोभेची फुले या उद्यानाचे सौंदर्य खुलवतात. पाण्याचे झरे आणि विविध फुले यामुळे तऱ्हेतऱ्हेचे पक्षी येथे पाणी प्यायला आणि विसाव्याला येतात. पुण्यातील आणि पुण्याबाहेरील अनेक छायाचित्रकारांचे पु.ल. देशपांडे उद्यान हे एक आवडते ठिकाण आहे.\nया परिसरातील अनेक मंडळी रोज सकाळी व्यायाम करायला आणि सकाळची शुद्ध हवा घेण्यासाठी या उद्यानात येतात.\nसध्या या उद्यानात अजून काही वैशिट्यपूर्ण गोष्टींची भर घालणे चालू आहे. \"मुघल उद्यान\" हा त्याचाच एक भाग आहे.\n१ माहिती व पर्यटन\nक्षेत्रफळ - १० एकर\nआतील चालायच्या रस्त्याची लांबी - ९२० मीटर\nभेट देण्याचा सर्वोतम काळ - वर्षभर\nउद्यानची वेळ - सकाळी सूर्योदयापासून ते ११ वाजेपर्यंत संध्याकाळी ४.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत\nविशेष - उद्यानात पायीच चालता येते.\nप्रवेश दर - ५ रुपये\nलोकसत्ता वृत्तपत्रामधील लेख (मराठी मजकूर)\nमायबोलीवरील लेख (मराठी मजकूर)\nसकाळ वृत्तपत्रामधील बातमी (मराठी मजकूर)\nपु.ल. देशपांडे उद्यानाविषयी \"पुणे साईट\" संकेतस्थळावरील लेख (इंग्लिश मजकूर)\nपु.ल. देशपांडे उद्यानाविषयी आंतर्जालात असलेला एक लेख (इंग्लिश मजकूर)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nखडकीचे युद्ध · पुण्यातील प्लेगची साथ · रँडचा खून · पानशेतचा पूर · पुण्यावरचा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्‍न ·\nसंत तुकाराम · शहाजी भोसले · जिजाबाई · छत्रपती शिवाजी · छत्रपती संभाजी · · तानाजी मालुसरे · बाजी पासलकर · कान्होजी जेधे · पहिले बाजीराव पेशवे · नानासाहेब पेशवे · बाळ गंगाधर टिळक · शाहिस्तेखान · वि.दा.सावरकर · महात्मा फुले · गोपाळ कृष्ण गोखले · विठ्ठल रामजी शिंदे · जयंत नारळीकर · रा.गो.भांडारकर · महादेव गोविंद रानडे · बाळाजी विश्वनाथ भट · माधवराव पेशवे · नारायणराव पेशवे · रघुनाथराव पेशवे · सवाई माधवराव पेशवे · दुसरे बाजीराव पेशवे · दुसरे नानासाहेब पेशवे · चापेकर बंधू\nशनिवार वाडा · शिंद्यांची छत्री\nमहापौर · पुणे पोलीस · पुणे महानगरपालिका · पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड · पुणे महानगर क्षेत्र\nलालमहाल · शनिवार वाडा · आगाखान पॅलेस · रुबी हॉल · विश्रामबाग वाडा · बालभारती · पुणे विद्यापीठ ·\nचतुःशृंगी · श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती · दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर · तुळशीबाग राम मंदिर · पाताळेश्वर · कसबा गणपती · दशभुजा गणपती · गजानन महाराज मंदिर · तळ्यातला गणपती · तुकाराम पादुका मंदिर · ज्ञानेश्वर पादुका मंदिर · खुन्या मुरलीधर मंदिर · गुंडाचा गणपती · उंबर्‍या गणपती मंदिर · बिजवर विष्णू मंदिर · पासोड्या विठ्ठल मंदिर · नवा विष्णू मंदिर\nदुध्या मारुती · शनी मारुती · अकरा मारुती · डुल्या मारुती · सोन्या मारुती · दक्षिणमुखी मारुती · पत्र्या मारुती · जिलब्या मारुती · नवश्या मारुती\nराजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालय · महात्मा फुले वस्तु संग्रहालय · बाबासाहेब आंबेडकर वस्तु संग्रहालय · पुणे आदिवासी वस्तु संग्रहालय · राष्ट्रीय युद्धवस्तु संग्रहालय\nउद्याने आणि प्राणी संग्रहालये\nबंड गार्डन · राजीव गांधी उद्यान · शामाप्रसाद मुखर्जी उद्यान · शाहू उद्यान · पेशवे पार्क · सारस बाग · एम्प्रेस गार्डन · कमला नेहरू पार्क · संभाजी पार्क · थोरात पार्क · ताथवडे उद्यान · नाना-नानी पार्क · पु.ल. देशपांडे उद्यान\nआदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल, पुणे · अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म पुणे · औंध चेस्ट हॉस्पिटल, पुणे · बोरा हॉस्पिटल, पुणे · चितळे ई एन टी हॉस्पिटल, पुणे · डी वाय पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे · दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे · देवधर आय हॉस्पिटल, पुणे · गोडबोले हॉस्पिटल, पुणे · गुप्ते हॉस्पिटल, पुणे · हर्डीकर हॉस्पिटल, पुणे · इन्लॅक अँड बुधरानी हॉस्पिटल, पुणे · जालन्स हेंल्थ केअर अँड डायबेटिस केअर सेंटर, पुणे · जहांगीर हॉस्पिटल, पुणे · जोग हॉस्पिटल, पुणे · जोशी क्लिनिक, पुणे · के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे · कमला नेहरू हॉस्पिटल, पुणे · कर्णे हॉस्पिटल, पुणे · केअरिंग हॉस्पिटल, पुणे · कृष्णा हॉस्पिटल, पुणे · लोकमान्य केअर हॉस्पिटल, पुणे · मेडिपॉइंट हॉस्पिटल, पुणे · नायडू हॉस्पिटल, पुणे · नाईक हॉस्पिटल, पुणे · एन्‌ एम्‌ वाडिया हॉस्पिटल, पुणे · नोबेल हॉस्पिटल, पुणे · पूना हॉस्पिटल, पुणे · रत्‍ना मेमोरियल हॉस्पिटल, पुणे · रुबी हॉल क्लिनिक, पुणे · सह्याद्री हॉस्पिटल, पुणे · साईस्नेह हॉस्पिटल, पुणे · समर्थ हॉस्पिटल, पुणे · संचेती हॉस्पिटल, पुणे · संजीवन हॉस्पिटल, पुणे · ससून जनरल हॉस्पिटल, पुणे · श्री हॉस्पिटल, पुणे · सुरज हॉस्पिटल, पुणे · सूर्या हॉस्पिटल, पुणे · सूर्यप्रभा नर्सिंग होम, पुणे\nटाटा मोटर्स लिमिटेड · कमिन्स इंडिया लिमिटेड · बजाज ऑटो लिमिटेड · फोर्स मोटर्स लिमिटेड · एस के एफ लिमिटेड · जनरल मोटर्स लिमिटेड · टाटा टोयो लिमिटेड · इन्फोसिस · आय.बी.एम. · के पी आय टी कमिन्स इन्फोसिस्टिम्स लिमिटेड\nपुण्यातील रस्ते#मुंबई-पुणे-बंगलोर महामार्ग • पुणे-नाशिक NH 50 • पुणे-सोलापूर रस्ता • कर्वे रस्ता • एफ सी रस्ता • जंगली महाराज रस्ता • टिळक रस्ता • एम जी रस्ता • लक्ष्मी रस्ता • सिंहगड रस्ता • पुणे-पौड • लॉ कॉलेज रस्ता • कॅनॉल रस्ता • छत्रपती शिवाजी रस्ता • बाजीराव रस्ता\nपुणे रेल्वे स्थानक · शिवाजीनगर रेल्वे स्थानक · खडकी रेल्वे स्थानक\nमुंबई–पुणे महामार्ग · पुणे स्टेशन बस स्थानक · स्वारगेट बस स्थानक · शिवाजीनगर बस स्थानक\nमेहेर बाबा · ओशो · सवाई गंधर्व संगीत महोत्सव · वसंतोत्सव · गणेश उत्सव · पुणे फेस्टिवल · शनिवारवाडा महोत्सव · लालमहाल महोत्सव · शनिवारवाडा डान्स फेस्टिवल\nअभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे · अभिनव कला महाविद्यालय · आबासाहेब गरवारे महाविद्यालय · आय.एम.डी.आर. · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · ए.एफ.एम.सी. · कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · डेक्कन कॉलेज · नेस वाडिया महाविद्यालय · नौरोसजी वाडिया महाविद्यालय · पुम्बा · फर्ग्युसन महाविद्यालय · पुणे विद्यापीठ · बी.जे. मेडिकल कॉलेज · बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स · भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था · भारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय · मॉडर्न कॉलेज, पुणे · यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय , पुणे · राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी · विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे · स.प. महाविद्यालय · सिंबायोसिस · सिंबायोसिस विधि महाविद्यालय\nपुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन · २००८ कॉमन वेल्थ यूथ गेम्स\nवेताळ टेकडी · (हनुमान टेकडी) · फर्ग्युसन टेकडी · पर्वती · बाणेर टेकडी · कोथरूडची टेकडी · बावधनची टेकडी · सुतारवाडी टेकडी · कात्रज टेकडी · रामटेकडी · गुलटेकडी · चतुःशृंगी · तळजाई · वाघजाई · येरवड्याची येरंडेश्वर टेकडी\nमुळा नदी · मुठा नदी · मुळा-मुठा नदी · पीकॉक बे · कात्रज तळे · पाषाण तळे · रामनदी · आंबील ओढा · भैरोबा नाला · मुठा उजवा कालवा · मुठा डावा कालवा(कॅनॉल) · नागझरी-पूर्वीची नागनदी · देवनदी · टिळक तरणतलाव · सोमवार तरणतलाव\nसोमवार पेठ (शाहापूर पेठ) · मंगळवार पेठ · बुधवार पेठ · गुरुवार पेठ (वेताळ पेठ) · शुक्रवार पेठ · शनिवार पेठ · रविवार पेठ · कसबा पेठ · गंज पेठ (महात्मा फुले पेठ) · भवानी पेठ · घोरपडे पेठ · गणेश पेठ · सदाशिव पेठ · नारायण पेठ · रास्ता पेठ · नाना पेठ · नागेश पेठ (न्याहाल पेठ) · नवी पेठ\nपुणे कॅन्टोनमेंट · येरवडा · कल्याणी नगर · वडगांव शेरी · कोरेगाव पार्क · कोथरूड · स्वारगेट · शिवाजीनगर · औंध · लोहगाव · सोपान बाग · डेक्कन जिमखाना · नळ स्टॉप · एरंडवणे · पौड फाटा · पर्वती · मुकुंदनगर · महर्षीनगर · गुलटेकडी · एरंडवणे · सॅलीसबरी पार्क · बोपोडी · हिरा बाग\nरेंज हिल्स · खडकी · खडकी कॅन्टोनमेंट · गणेशखिंड · दत्तवाडी · सहकारनगर · धनकवडी · बिबवेवाडी · लुल्लानगर · अप्पर कोंढवा · घोरपडी · फातिमानगर · वानवडी · विश्रांतवाडी · रामवाडी · वनाझ · खराडी · गोखले नगर\nउंड्री · औंध · औताडे-हांडेवाडी · कळस गाव · कात्रज · कासारवाडी · कोंढवा बुद्रुक · कोथरूड · खडकी · दापोडी · देहू रोड · धनकवडी · धायरी · निगडी (पुणे) · पाषाण · पिसोळी · बाणेर · बोपखेल · भोसरी · वडगांव बुद्रुक · विठ्ठलवाडी (पुणे) · आनंद नगर (पुणे) ·\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० मे २०१७ रोजी २३:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/pm-modi-book-on-dealing-with-stress-for-students-1626802/", "date_download": "2018-08-18T11:12:30Z", "digest": "sha1:CEFIY746QATH3AT32MR5PMPBQN7DUE2H", "length": 16114, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PM Modi book on Dealing with Stress for students | पुस्तक परीक्षण | Loksatta", "raw_content": "\nबेशिस्त वाहनचालकांना ९१ लाखांचा दंड\nपक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा\nपुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित\nजळगावमध्ये महाजन-खडसे गटबाजीची सर्वत्र बाधा\nएमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल\nगेल्या साठ वर्षांत या मुलांना परीक्षेच्या व्यापम तणावाला तोंड द्यावे लागत आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या ‘एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तकाचे प्रकाशन मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते शनिवारी नवी दिल्लीत झाले.\nचाचा मोदीजींनी नमोजाकिटाच्या काज्यात ताजी टवटवीत कमलकळी खोविली. केसांवरून हात फिरवून चापूनचोपून सरसे केले. ऐन्यात स्वत:स चारी कोनांत नीट न्याहाळीत पटकन् छानशी सेल्फी घेतली. एकदा सकाळची सेल्फी उत्तम निघाली की मग चाचाजींच्या दिवसाचा मस्तच सूर लागतो. मग कितीही नव्या घोषणांची रचना करावी लागली, कितीही भाषणे करावी लागली तरी त्यांस त्याचे काहीएक नसते. परंतु आजचा दिवस काहीसा वेगळा होता. आज त्यांच्यापुढती महागंभीर असे कार्य होते. त्यांच्या मनी आले, एक वेळ दहा वेळा राफेल डील करावयास सांगा, १५ लक्ष वेळा कृष्णधन स्वदेशी आणावयास सांगा, दिवसातून दोनदा विदेश दौरा करावयास सांगा.. फिकीर नथी परंतु वाङ्मय समीक्षा सोपे का क्रियाकर्म आहे ते त्यातही पुन्हा स्वलिखित जागतिक वाऱ्याची समीक्षा करणे म्हणजे कर्मकठीणच. परंतु एकदा चाचाजींनी कमिटमेन्ट केली की मग ते साक्षात् बृहस्पती जरी आले तरी त्यांचेही ऐकत नाहीत. ते आपण निश्चलनीकरणाचे समयी पाहिलेच. आजही त्यांनी निश्चयच केला होता, की आजच्या आज या पुस्तकाचे परीक्षण करावयाचेच व संपूर्ण विश्वाच्या इतिहासात असे पुस्तक परीक्षण करणारे पहिले पंतप्रधान म्हणून लिम्काबुकी आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरावयाचेच. लिम्काच काय, गिनेस बुकासही ते कोरावेच लागणार. कां की, अद्याप एकाही लेखकप्राण्याने स्वत:च स्वत:च्या पुस्तकाचे परीक्षण लिहिलेले नाही. चाचाजींनी क्षणभर डोळे मिटले. गोमातेस मनोमन दंडवत घातले व पुस्तक परीक्षण लेखनास प्रारंभ केला : बालमित्रों, जगातील कोण्या पंतप्रधानाने असे एक्झाम वॉरिअर्स नावाचे पुस्तक लिहिले आहे का त्यातही पुन्हा स्वलिखित जागतिक वाऱ्याची समीक्षा करणे म्हणजे कर्मकठीणच. परंतु एकदा चाचाजींनी कमिटमेन्ट केली की मग ते साक्षात् बृहस्पती जरी आले तरी त्यांचेही ऐकत नाहीत. ते आपण निश्चलनीकरणाचे समयी पाहिलेच. आजही त्यांनी निश्चयच केला होता, की आजच्या आज या पुस्तकाचे परीक्षण करावयाचेच व संपूर्ण विश्वाच्या इतिहासात असे पुस्तक परीक्षण करणारे पहिले पंतप्रधान म्हणून लिम्काबुकी आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरावयाचेच. लिम्काच काय, गिनेस बुकासही ते कोरावेच लागणार. कां की, अद्याप एकाही लेखकप्राण्याने स्वत:च स्वत:च्या पुस्तकाचे परीक्षण लिहिलेले नाही. चाचाजींनी क्षणभर डोळे मिटले. गोमातेस मनोमन दंडवत घातले व पुस्तक परीक्षण लेखनास प्रारंभ केला : बालमित्रों, जगातील कोण्या पंतप्रधानाने असे एक्झाम वॉरिअर्स नावाचे पुस्तक लिहिले आहे का नेहरू स्वत:ला चाचा म्हणत, पण त्यांनी तरी असे पुस्तक लिहिले आहे का नेहरू स्वत:ला चाचा म्हणत, पण त्यांनी तरी असे पुस्तक लिहिले आहे का पण माझ्या सरकारमध्ये मी हे पुस्तक लिहिले. कारण माझे मुलांवर खरेखरे प्रेम आहे. गेल्या साठ वर्षांत या मुलांना परीक्षेच्या व्यापम तणावाला तोंड द्यावे लागत आहे. मी लहान असताना साठ वर्षे मलाही हा तणाव सहन करावा लागला बालमित्रों पण माझ्या सरकारमध्ये मी हे पुस्तक लिहिले. कारण माझे मुलांवर खरेखरे प्रेम आहे. गेल्या साठ वर्षांत या मुलांना परीक्षेच्या व्यापम तणावाला तोंड द्यावे लागत आहे. मी लहान असताना साठ वर्षे मलाही हा तणाव सहन करावा लागला बालमित्रों आजही ती परीक्षा, त्या पेपरांतली ती प्रश्नपरिषद.. टाळतोच मी तो तणाव. अशा प्रकारे तणावमुक्त झाल्यामुळेच मित्रों, आज मी शिक्षण क्षेत्रात उत्तुंग यश मिळवले आहे. आणि म्हणूनच आजवर कोणत्याही शिक्षकाला, पालकाला जे करता आले नाही, ते मी केले आहे. आता या पुस्तकामुळे संपूर्ण देश तणावमुक्त होणार आहे. हे पुस्तक म्हणजे परीक्षायोद्धय़ांसाठीची नमोगीता आहे बालमित्रों आजही ती परीक्षा, त्या पेपरांतली ती प्रश्नपरिषद.. टाळतोच मी तो तणाव. अशा प्रकारे तणावमुक्त झाल्यामुळेच मित्रों, आज मी शिक्षण क्षेत्रात उत्तुंग यश मिळवले आहे. आणि म्हणूनच आजवर कोणत्याही शिक्षकाला, पालकाला जे करता आले नाही, ते मी केले आहे. आता या पुस्तकामुळे संपूर्ण देश तणावमुक्त होणार आहे. हे पुस्तक म्हणजे परीक्षायोद्धय़ांसाठीची नमोगीता आहे बालमित्रों मुलांमध्ये परीक्षा देण्याचा कौशल्यविकास झाला, तर बालमित्रों, त्यांना अभ्याससुद्धा करावा लागणार नाही. गेली साठ वर्षे त्यांनी हे कौशल्य लातूरमध्ये, कोटामध्ये अडकून ठेवले होते. परंतु मी भगीरथ प्रयत्न करून ती कौशलगंगा संपूर्ण देशात नेली आहे. नेली आहे की नाही मुलांमध्ये परीक्षा देण्याचा कौशल्यविकास झाला, तर बालमित्रों, त्यांना अभ्याससुद्धा करावा लागणार नाही. गेली साठ वर्षे त्यांनी हे कौशल्य लातूरमध्ये, कोटामध्ये अडकून ठेवले होते. परंतु मी भगीरथ प्रयत्न करून ती कौशलगंगा संपूर्ण देशात नेली आहे. नेली आहे की नाही नेली, याचा पुरावाच आहे बालमित्रों. आज शाळाशाळांमध्ये संस्थाचालक या पुस्तकावर उडय़ा मारत आहेत. मला तर असे सांगण्यात आले आहे, की भाजपचे काही खासदारसुद्धा गुपचूप हे पुस्तक वाचत आहेत. काही मुले तर इतकी तणावमुक्त झाली आहेत, की ती शिक्षकांना म्हणत आहेत, आम्हांला शिकवू नका, फक्त परीक्षा घ्या नेली, याचा पुरावाच आहे बालमित्रों. आज शाळाशाळांमध्ये संस्थाचालक या पुस्तकावर उडय़ा मारत आहेत. मला तर असे सांगण्यात आले आहे, की भाजपचे काही खासदारसुद्धा गुपचूप हे पुस्तक वाचत आहेत. काही मुले तर इतकी तणावमुक्त झाली आहेत, की ती शिक्षकांना म्हणत आहेत, आम्हांला शिकवू नका, फक्त परीक्षा घ्या तणावमुक्त परीक्षेचे हे नवेच मॉडेल आहे. त्याचे वैशिष्टय़ असे, की ते कोणत्याही परीक्षेला लागू पडते. मग ती महागाईची असो, की भ्रष्टाचाराची. एकदा तणाव दूर झाला की सर्व परीक्षा सोप्याच होतात. तेव्हा सर्वानीच हे पुस्तक वाचले पाहिजे. वाचले पाहिजे की नाही मित्रों\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n पिंपरीत पित्याने दोन मुलांची हत्या करुन केली आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nIt's Official: नात्यावर शिक्कामोर्तब करत अखेर निक-प्रियांका म्हणाले....\nसहजीवनाचा पहिला टप्पा सर, थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा\nइम्रान खानच्या शपथविधीला सिद्धूंना मानाचे स्थान, घेतली लष्करप्रमुखांची गळाभेट\nमिनी एसयुव्हीसारखं डिझाईन असलेली नवीन रेनाँ क्विड वसूल करते तुमचा पै न पै\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nअंतर्गत वाहतुकीसाठी ट्रामचा पर्याय\nवाहनांना एक टोल माफ\nरेल्वेचे संगणकीय आरक्षण केंद्र पावणेतीन तास बंद राहणार\nस्वानंद देणारे शिक्षण निवडा\nवामनदादा कर्डकांना शाहिरीतून अभिवादन\nभूगावमधील हॉटेलमध्ये कोंबडय़ांच्या झुंजीवर जुगार\nपाणी पुरेना आणि म्हणे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/police-looted-millions-rupees-45170", "date_download": "2018-08-18T10:48:52Z", "digest": "sha1:YWCAHEY2VSJADA4CLO4OI6JDJ5B3OYNE", "length": 11435, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Police looted millions of rupees पोलिसानेच घातला लाखो रुपयांचा गंडा | eSakal", "raw_content": "\nपोलिसानेच घातला लाखो रुपयांचा गंडा\nसोमवार, 15 मे 2017\nमुंबई - म्हाडाचे घर मिळवून देतो, अशी भूलथाप देऊन पोलिस हवालदारानेच माजी राज्यमंत्र्याच्या स्वीय सहायकाला 17 लाखांचा गंडा घातला. वरळी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. नितीन श्रीरंग गायकवाड (वय 41) असे त्याचे नाव आहे. 2011 ते 2014 या कालावधीत ही फसवणूक झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.\nमुंबई - म्हाडाचे घर मिळवून देतो, अशी भूलथाप देऊन पोलिस हवालदारानेच माजी राज्यमंत्र्याच्या स्वीय सहायकाला 17 लाखांचा गंडा घातला. वरळी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. नितीन श्रीरंग गायकवाड (वय 41) असे त्याचे नाव आहे. 2011 ते 2014 या कालावधीत ही फसवणूक झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.\nतक्रारदार विजय काळे हे माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांचे 2010 मध्ये स्वीय सहायक होते. त्याच वेळी हवालदार गायकवाड माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांचा अंगरक्षक होता. त्यामुळे गायकवाडचे मंत्रालयात सतत जाणे व्हायचे. त्यातूनच त्याचा काळे यांच्याशी परिचय झाला. काळे त्या वेळी त्यांच्या भावासाठी घर शोधत होते. म्हाडाचे घर स्वस्तात मिळवून देतो, अशी भूलथाप देत गायकवाडने काळे यांच्याकडून टप्प्याटप्प्याने सुमारे साडे सतरा लाख रुपये घेतले. मात्र, घर न मिळाल्याने काळे यांनी पैसे परत मागितल्यानंतर गायकवाडने टाळाटाळ केली. अखेर, काळे यांनी वरळी पोलिसांत तक्रार दिली होती. शनिवारी पोलिसांनी गायकवाडला अटक केली. याआधी गायकवाडच्या विरोधात माटुंग्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता.\nपिंपरी - दोन मुलांना मारून वडिलांची आत्महत्या\nपिंपरी (पुणे) - दोन मुलांना मारून वडिलांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना शनिवारी दुपारी ताथवडे येथे घडली. शुभम बर्मन (वय १०) रूपम वर्मा (वय...\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nऔरंगाबाद : 'एमआयएम'च्या नगरसेवकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा\nऔरंगाबाद : महापालिकेत एमआयएम नगरसेकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या पाच नगरसेवकांविरोधात शुक्रवारी (ता.17) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयएम नगरसेवक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/609541", "date_download": "2018-08-18T10:24:01Z", "digest": "sha1:XW4DI5BCWWBPH7TEYXIFOX4MT5GYFKG6", "length": 5838, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुक्ताईनगर तालुक्यात पट्टेदार वाघ आढळला मृतावस्थेत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » मुक्ताईनगर तालुक्यात पट्टेदार वाघ आढळला मृतावस्थेत\nमुक्ताईनगर तालुक्यात पट्टेदार वाघ आढळला मृतावस्थेत\nऑनलाईन टीम/ जळगाव :\nमुक्ताईनगर तालुक्मयात रविवारी पुन्हा एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला आहे. हा घातपात आहे की वाघाचा नैसर्गिक मृत्यू या बाबत शंका उपस्थित केली जात आहे. वर्षभरातील ही दुसरी घटना असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच वनविभागाच्या कार्यप्रणालीवर बोट ठेवले जात आहे.\nमुक्ताईनगर तालुक्मयात थेरोळा गावालगतच्या पूर्णा नदीपात्रात रविवारी सकाळी एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. या वाघाच्या पायाला ठिबकच्या नळ्या बांधलेल्या आढळून आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वाघाच्या नैसर्गिक मृत्यूबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. मुक्ताईनगर तालुक्मयातच चार महिन्यांपूर्वी केळीच्या बागेत एका वाघीणीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता आणखी एक पट्टेदार मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. पट्टेदार वाघ ही प्रजाती लोप पावण्याच्या उंबरठय़ावर असताना प्रत्येक पट्टेदार वाघ वाचविण्याची गरज आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वढोडा वनक्षेत्राधिकारी व त्यांचे सहकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. निसर्गचक्रातील वाघ हा महत्त्वपूर्ण घटक असल्याने ‘वाघ बचाव’ मोहीम देशभर राबविण्यात येत असताना वर्षभरात दोन पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.\nऔरंगाबादेत राष्ट्रीय विधी विद्यापीठ उभारणार : अर्थमंत्री\nसावत्र बापाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nरजनीकांत लवकरच करणार राजकारणात प्रवेश\nअमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathisaahitya.blogspot.com/2011/09/blog-post_29.html", "date_download": "2018-08-18T10:32:23Z", "digest": "sha1:PMYGWRT7XBJUKKT2632VVMUFBVC5NEVB", "length": 11629, "nlines": 118, "source_domain": "marathisaahitya.blogspot.com", "title": "मी मराठी : A Blog for Marathi Fun,Marathi Jokes,Marathi Poems,Marathi SMS and All about Marathi: कारण मी कधीच रिस्क घेत नाही", "raw_content": "\nमी मराठी: - हा कुठलाही फ़ुकटचा कोड कॉपी करुन देण्यासाठी बनविन्यात आलेला नाही. तसेच जे लोकांना एखादा विनोद एकणे,वाचणे म्हणजे वेळेचा अपव्यय (मराठीत टाईमपास) वाटतो त्यांच्यासाठी सुधा नाही. या ब्लॉगवरील सर्व साहित्या हे कुठल्या ना कुठल्या मेलधुन आलेले आहे व ते एका ठीकाणी ठेवायचे म्हणुन हा सगळा उद्योग केलेला आहे.(कानात ह्ळुच :- सर्व चोरलेले आहे) दोन घडी हसायचे असेल तरच इथे वेळ घालवा अन्यथा गुगल आहेच..... Marathi Poems, Marathi Jokes, Marathi Poems, Marathi Shayari and more\nकारण मी कधीच रिस्क घेत नाही\n- दारु पिताना मी कधीच रिस्क घेत नाही मी संध्याकाळी घरी येतो तेव्हा बायको स्वयंपाक करत असते, शेल्फमधील भांड्यांचा आवाज बाहेर येत असतो, मी चोरपावलाने घरात येतो, माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो, शिवाजीमहाराज फोटोतून बघत असतात, या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही ... . ||१||\nवापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरुन मी ग्लास काढतो, पटकन एक पेग भरुन आस्वाद घेतो, ग्लास धुवून पुन्हा फळीवर ठेवतो, अर्थात बाटलीही काळ्या कपाटात ठेवतो, शिवाजीमहाराज मंद हसत असतात, स्वयंपाकघरात डोकावून बघतो, बायको कणीकच मळत असते, तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही ... . ||२||\nमी : जाधवांच्या मुलीच्या लग्नाचं जमलं का गं\n दानत असेल तर मिळेल ना चांगलं स्थळ मी परत बाहेर येतो, काळ्या कपाटाच्या दाराचा आवाज होतो, बाटली मात्र मी हळूच काढतो, वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरुन मी ग्लास काढतो, पटकन एक पेग भरुन आस्वाद घेतो, बाटली धुवून मोरीत ठेवतो, काळा ग्लास पण कपाटात ठेवतो, तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही ... . ||३||\nमी : अर्थात जाधवांच्या मुलीचं अजून काही लग्नाचं वय झालं नाही..\nती : नाही काऽऽय अठ्ठावीस वर्षांची घोडी झालीये म्हणे..\nमी : (आठवून जीभ चावतो) अच्छा अच्छा ... मी पुन्हा काळ्या कपाटातून कणीक काढतो, मात्र कपाटाची जागा आपोआप बदललेली असते, फळीवरुन बाटली काढून पटकन मोरीत एक पेग मारतो, शिवाजी महाराज मोठ्ठ्याने हसतात, फळी कणकेवर ठेवून, शिवाजीचा फोटो धुवून मी काळ्या कपाटात ठेवतो, बायको गॅसवर मोरीच ठेवत असते, या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही ... . ||४||\nमी : (चिडून) जाधवांना घोडा म्हणतेस पुन्हा बोललीस तर जीभच कापून टाकीन\nती : उगीच कटकट करु नका... बाहेर जाऊन गप पडा...\nमी कणकेमधून बाटली काढतो, काळ्या कपाटात जाऊन एक पेग मळतो, मोरी धुवून फळीवर ठेवतो, बायको माझ्याकडे बघून हसत असते, शिवाजीमहाराजांचा स्वयंपाक चालूच असतो, पण ह्या जाधवांचा त्या जाधवाना पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही ... . ||५||\nमी: (हसत हसत) जाधवांनी घोडीशी लग्न ठरवलं आहे म्हणे\nती: (ओरडून) तोंडावर पाणी मारा\nमी परत स्वयंपाकघरात जातो, हळूच फळीवर बसतो, गॅसही फळीवरच असतो.. बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येतो, मी डोकावून बघतो ... बायको मोरीत दारूचा आस्वाद घेत असते, ह्या घोडीचा त्या घोडीला पत्ता लागत नाही, अर्थात शिवाजी महाराज कधीच रिस्क घेत नाहीत.. जाधवांचा स्वयंपाक होईपर्यंत्...मी फोटोतून बायकोकडे बघून हसत असतो... कारण मी कधीच रिस्क घेत नाही...||६|| --\n१०१ Puneri Paatya - पुणेरी पाट्या\nPuneri Paatya, Graphiti, Marathi Jokes, Mail Forwards आलेले मेल, सापडलेले फ़ोटो, कुणीतरी दिलेल्या कविता , सडलेले विनोद फ़ुटकळ साहित्य .\nइमेज निट पहाण्यासाठी त्यावर उंदराचे बटण दाबा.\nकारण मी कधीच रिस्क घेत नाही\nवैधनिक इशारा-अतिशय पांचट आहे ,ज्यांना झेपणार नाही ...\nआजकाल WhatsApp सारख्या माध्यमामुळे लेखकांचे साहित्य जगभर पसरत आहे परंतु बरेच जण ते कुणा दुस-याच्या नावाने वा स्वताच्या नावानेही प्रसिद्ध करतात. ज्याचे त्याचे श्रेय त्यांना मिळालेच पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहोत. बर-याचदा असेही आढळले आहे कि कुठलातरी विनोद किंवा कविता अगदी पु.ल. किंवा सुरेश भट यांच्या नावाने पाठवली जाते. तरी वाचकांनी मूळ लेखकाचा शोध घ्यावा व असे साहित्य आढळल्यास प्रसिद्ध करणा-या वेबसाईटला कळवावे . आपल्याला आपले साहित्य या ब्लॉगवर कुणा दुसर-याच्या नावाने किंवा आपल्याला श्रेय न देता प्रसिद्ध केलेले आढळल्यास कृपया vikram.taware@gmail.com या आयडी वर संपर्क करा. या ब्लॉगवरील कुठलेही साहित्य आम्ही स्वतः लिहिलेले नाही व विक्रम तावरे हे लेखक नाहीत त्यामुळे मूळ लेखकाला श्रेय देण्यामध्ये आम्हाला कुठलीही आपत्ती नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/samsung-es90-point-shoot-digital-camera-black-price-paxgf.html", "date_download": "2018-08-18T10:07:04Z", "digest": "sha1:SY5E7VUEGKWQ7LJKRWJD52JELYGSAUO4", "length": 18601, "nlines": 448, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग इस्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसॅमसंग इस्९० पॉईंट & शूट\nसॅमसंग इस्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nसॅमसंग इस्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसॅमसंग इस्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nसॅमसंग इस्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये सॅमसंग इस्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nसॅमसंग इस्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत Jul 11, 2018वर प्राप्त होते\nसॅमसंग इस्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅकऍमेझॉन, होमेशोप१८ उपलब्ध आहे.\nसॅमसंग इस्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 4,990)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसॅमसंग इस्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया सॅमसंग इस्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसॅमसंग इस्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 5 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसॅमसंग इस्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसॅमसंग इस्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nअपेरतुरे रंगे f/3.5 - f/5.9\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14.2 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 Inches\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 1/8 sec\nरेड इये रेडुकशन Yes\nमॅक्रो मोडे 5 - 80 cm (W)\nस्क्रीन सिझे 2.7 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230000 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1280 x 720 pixels (HD)\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 16:9, 3:2, 1:1\nमेमरी कार्ड तुपे SD, SDHC\nइनबिल्ट मेमरी 37 MB\nएक्सटेर्नल मेमरी Yes; Up to 16 GB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nसॅमसंग इस्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\n3/5 (5 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-18T10:52:39Z", "digest": "sha1:E7UVRYXHJVRDYZ2SRCHLOVXXNGUNB7NJ", "length": 6898, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिक्षण आयुक्‍त पदी विशाल सोलंकी यांची नियुक्‍ती | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशिक्षण आयुक्‍त पदी विशाल सोलंकी यांची नियुक्‍ती\nडॉ.बीपीन शर्मा यांची महाऊर्जामध्ये बदली\nपुणे,दि.16 – राज्याच्या शालेय शिक्षण आयुक्‍तपदी वर्षही पूर्ण न झालेल्या डॉ.बीपीन शर्मा यांची शासनाकडून पुन्हा एकदा बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आसाम केडरचे विशाल सोलंकी यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. मात्र सोलंकी यांचे नाव एका आर्थिक घोटाळ्यात अडकल्याने त्यांच्यावर गुवाहटी येथे गुन्हाही दाखल झाल्याचे समोर येत आहे.\nडॉ.बिपीन शर्मा यांची मागील वर्षी मे महिन्यात शालेय शिक्षण विभागात बदली झाली होती. डॉ. शर्मा यांनी याआधी पुण्यातील साखर आयुक्‍ताचा पदभार सांभळला होता. मात्र त्यांच्या बदलीला वर्षही पूर्ण होत नाही तोवरच त्यांची पुन्हा एकदा महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण येथे बदली करण्यात आली आहे.\nशिक्षण विभागात एका वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली कधी होते आहे याची वाट सर्व जण पहात असताना त्या अधिकाऱ्याची बदली मात्र तीन वर्ष होत नाही. मात्र एस.चोक्‍कलिंगम असो वा डॉ.बिपीन शर्मा असो अशा चांगल्या अधिकाऱ्यांची बदली काही दिवसांतच कशी होते अशी चर्चा सध्या शिक्षण वर्तुळात रंगते आहे.\nगेल्या आठ महिन्याच्या कालावधीत सरकारी धाकामुळे फारसे प्रकाशझोतात आले नसले तरीही डॉ.बिपीन शर्मा यांनी चांगले काम केले असल्याची चर्चा शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 30 हजार कि.मी.चे रस्ते बांधणार\nNext articleसंत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पंढरपूर पायी पालखी सोहळ्यासाठी रथ प्रदान सोहळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/609545", "date_download": "2018-08-18T10:23:59Z", "digest": "sha1:JXHJ6CAQFZUKIL7NO5ZBJCLGWUYYQJ4P", "length": 12210, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विद्यार्थी, शिक्षकांच्या हजेरीसाठी येणार ‘ऍप’ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » विद्यार्थी, शिक्षकांच्या हजेरीसाठी येणार ‘ऍप’\nविद्यार्थी, शिक्षकांच्या हजेरीसाठी येणार ‘ऍप’\nरेंज नसतानाही माहिती भरता येणार : तालुकापातळीवर होणार मुक्त संपर्क केंद्र\nचंद्रशेखर देसाई / कणकवली:\nशाळांमधील विद्यार्थ्यांची हजेरी सध्या सरलच्या माध्यमातून भरण्यात येते. यासाठी शाळांमध्ये इंटरनेट सुविधा नसल्यास, रेंज येत नसल्यास अडचणी निर्माण होतात. या साऱयांबाबत शिक्षकांमध्ये नाराजी असतानाच आता शिक्षण विभागाकडून या हजेरीसाठी ऍप उपलब्ध करण्यात येणार आहे. या ऍपच्या माध्यमातून वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांची हजेरी भरल्यानंतर त्या शिक्षकांचीही उपस्थिती आपोआपच नोंद होणार आहे. यासाठी रेंजची आवश्यकता नसून रेंजमध्ये आल्यानंतर या ऍपमध्ये नोंदविलेली माहिती सरलच्या आपल्या यूडायसमध्ये आपोआप नोंद होणार आहे. तसेच शाळाबाहय़ विद्यार्थ्यांसाठी तालुक्याच्या ठिकाणी मुक्त संपर्क केंद्र सुरू करण्याचाही प्रयत्न असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.\nशाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती सध्या सरलच्या माध्यमातून ऑनलाईन नोंद करण्याची कार्यवाही करण्यासंदर्भात आदेश दिलेले होते. मात्र, ही नोंद करण्यासाठी शाळा पातळीवर सध्या इंटरनेट असल्याने, असल्यास व्यवस्थित रेंज मिळत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागणार. त्यामुळे संघटनापातळीवर या कार्यवाहीला यापूर्वी जोरदार विरोध झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी याबाबत देण्यात आलेल्या आदेशाची नंतर अंमलबजावणी झाली नाही.\nया पार्श्वभूमीवर ऑनलाईन हजेरीची नोंद करण्यासाठी काय करता येईल, याबाबत शासनस्तरावर विचार सुरू होता. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आता यासाठी लवकरच स्वतंत्र ऍप विकसित करण्यात येणार आहे. राज्यपातळीवर याबाबतचा डेमोही झाला. या ऍपनुसार वर्गशिक्षकांनी सर्व माहिती ऑनलाईन ऍपवर प्रथम भरायची आहे. त्यानंतर वर्गशिक्षकांनी नियमितपणे हजेरी घेतल्यानंतर विद्यार्थी हजेरी ऑनलाईन ऍपवर भरायची. अशी माहिती भरली, की विद्यार्थ्यांसह शिक्षकांचीही उपस्थिती ऑनलाईन उपलब्ध होते. वर्गशिक्षक गैरहजर असतील, तर मुख्याध्यापकांनी हजेरी घ्यायची आहे. अशावेळी वर्गशिक्षकांच्या रजेची नोंदही आपोआपच ऑनलाईनला होते. ही माहिती भरण्यासाठी रेंजची आवश्यकता नाही. ज्यावेळी संबंधीत शिक्षक रेंजमध्ये येतील, त्यावेळी सरलच्या यूडायसमध्ये याबाबतची आपोआपच नोंद होते व उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थितीही उपलब्ध होते.\nप्रत्येक तालुक्यात तालुक्याच्या ठिकाणी मुक्तसंपर्क केंद्र सुरू करण्यात येणार आहे. ही मुक्त संपर्क केंद्रे पाचवी, आठवी, दहावी व बारावीसाठी सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे सुत्रांनी सांगितले. या केंद्रात जे विद्यार्थी कधीच शाळेत गेलेले नाहीत, त्यांना 5, 8, 10, 12 वयोगटानुसार प्रवेश देण्यात येणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंदणी करून प्रवेश देण्याचेही प्रस्तावीत आहे. अप्रगत विद्यार्थ्यांनाही या मुक्त संपर्क केंद्रात प्रवेश देण्याच्या अनुषंगाने निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले. येथे आपली पाठय़पुस्तके, पूर्वतयारी पुस्तके, स्वयंअध्ययन पुस्तिका असणार आहे. यासाठी जि. प. शाळा, खासगी संस्था ऑनलाईन नोंदणी करू शकतात. किमान 50 व जास्तीत जास्त 100 विद्यार्थी एका केंदात असणार आहेत. येथे नोव्हेंबर व एप्रिल अशा दोनवेळा परीक्षा होणार आहेत. गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी पाहणी करून या केंद्रांना मान्यता देणार आहेत.\nपुढील वर्षापासून दहावीच्या प्रश्नपत्रिकेतही बदल करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही होण्याची शक्यता आहे. राज्याचा दहावीचा निकाल चांगला असला, तरीही देशपातळीवर विचार केल्यास 75 टक्के गुण घेणाऱया महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची टक्केवारी केवळ एक टक्का आहे. यासाठी यावर्षी एनसीईआरटीमार्फत माध्यमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्याबाबतही कार्यवाही होणार आहे. सर्व पर्यवेक्षिय यंत्रणेस गुणवत्तेवर अधिक भर देण्याच्या सूचना असून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची वैयक्तिक गुणवत्ता पाहण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. 31 जुलैपर्यंत केंद्रप्रमुखांनी सर्व माहिती भरण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.\nमासळीच्या ट्रकातील सांडपाणी अद्यापही रस्त्यावर\nट्रकच्या धडकेने दुचाकी चालक ठार\nमाध्यमिक शिक्षकांचे प्रस्ताव आर्थिक लाभासाठी प्रलंबित\nकिल्ले सिंधुदुर्गसाठी पुन्हा तरतूद, काम केव्हा\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%91%E0%A4%AA%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-18T09:57:31Z", "digest": "sha1:JTBYOHFDCHJQVHVO3FSWGICXMZ37PKZG", "length": 4060, "nlines": 101, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "निवडणुक डाटा एन्ट्री ऑपरेटर शुद्धीपत्रक | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nनिवडणुक डाटा एन्ट्री ऑपरेटर शुद्धीपत्रक\nनिवडणुक डाटा एन्ट्री ऑपरेटर शुद्धीपत्रक\nनिवडणुक डाटा एन्ट्री ऑपरेटर शुद्धीपत्रक\nनिवडणुक डाटा एन्ट्री ऑपरेटर शुद्धीपत्रक\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D.html", "date_download": "2018-08-18T11:03:49Z", "digest": "sha1:S4NY7XZXFPT56QQJ4HNHPDFQNPUOUYP6", "length": 26366, "nlines": 295, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | राहुल गांधी यांनी प्रकल्प रखडून ठेवले!", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » राहुल गांधी यांनी प्रकल्प रखडून ठेवले\nराहुल गांधी यांनी प्रकल्प रखडून ठेवले\n=राहुल गांधींची लुडबुड होतीच : जयंती नटराजन यांचा गौप्यस्फोट • कॉंग्रेसला रामराम=\nनवी दिल्ली, [३० जानेवारी] – गांधी घराण्याशी एकनिष्ठ मानल्या जाणार्‍या माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांनी शुक्रवारी थेट सोनिया आणि राहुल गांधी यांच्यावर हल्ला केला असून, संपुआ-२ सरकारच्या कार्यकाळात राहुल गांधी यांनी पर्यावरणाचे कारण देत मोठमोठे प्रकल्प रखडून ठेवायला भाग पाडले, असा गंभीर आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.\nनवी दिल्ली येथे शुक्रवारी आयोजित एका पत्रकार परिषदेत आपल्या कार्यकाळातील काही खळबळजनक खुलासे करतानाच जयंती नटराजन यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकत असल्याचाही निर्णय जाहीर केला. कॉंग्रेसच्या स्थापनेपासूनच माझे कुटुंब पक्षासोबत राहिले आहे. त्यामुळे आजचा क्षण माझ्यासाठी खूपच दु:खद आहे. मी ज्या कॉंग्रेसमध्ये होते ती कॉंग्रेस आज उरली नसून, पक्षातील लोकशाहीच संपुष्टात आली आहे, असा आरोप नटराजन यांनी केला. मी माझ्या पूर्ण क्षमतेने देश आणि पक्षाची सेवा करण्याचा प्रयत्न केला. मंत्री या नात्याने पर्यावरणाचे रक्षण करणे माझे कर्तव्य होते आणि तेच मी केले, असेही नटराजन म्हणाल्या.\nपर्यावरण मंत्री असताना कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी वैयक्तिकरीत्या आणि त्यांच्या कार्यालयाने मोठ्या प्रकल्पांना विरोध करणारी अनेक स्वयंसेवी संस्थांची निवेदने माझ्याकडे पाठविली आणि पर्यावरणाचे रक्षण होईल, हे सुनिश्‍चित करण्यास सांगितले. मंत्रिमंडळातील सहकार्‍यांनी आक्षेप घेतल्यानंतरही पक्ष आणि सरकारची भूमिका म्हणून मी माझे कर्तव्य पार पाडले. यामुळेच ओडिशाच्या नियामगिरी येथील वेदांता ग्रुपच्या ३० हजार कोटींच्या प्रकल्पाला मी मंजुरी दिली नाही, असेही नटराजन यांनी स्पष्ट केले.\nलोकसभा निवडणुकीला शंभर दिवस उरले असताना पक्ष संघटनेत काम करण्याच्या नावाखाली मंत्रिमंडळातून मला वगळण्यात आले आणि दुसर्‍याच दिवशी राहुल गांधी यांनी फिक्कीच्या कार्यक्रमात यानंतर कोणतेही प्रकल्प पर्यावरणामुळे रखडणार नाहीत, असे सांगितले. मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर मला पक्षात कोणतेही काम न देता खड्यासारखे बाजूला सारण्यात आले. याबाबत मी सोनिया व राहुल गांधी यांच्याकडे सातत्याने विचारणा केल्यानंतरही मला कोणतेही उत्तर मिळाले नाही आणि त्यामुळेच आज हा दु:खद निर्णय घ्यावा लागला. आर्थिक विकासाला खीळ बसल्याचा ठपका माझ्यावर ठेवण्यात आल्यामुळे हे स्पष्टीकरण दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nइच्छा नसताना मोदींवर टीका\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर कथित स्नूपगेटप्रकरणी इच्छा नसतानाही पक्षाची भूमिका म्हणून हल्ला केला. केंद्रीय मंत्री असल्याने मोदींवर टीका करण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवू नये आणि वैयक्तिक टीका करण्यापेक्षा त्यांच्या ध्येयधोरणावर टीका करावी, अशी भूमिका मी घेतली होती. परंतु, हायकमांडचा आदेश असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आल्यामुळे मी मोदींवर टीका केली. आपल्या कार्यकाळातील कामकाजाची सीबीआय किंवा इतर कोणत्याही संस्थेकडून चौकशी झाल्यास आपली तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दिल्ली विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच नटराजन यांनी टाकलेल्या या जबरदस्त बॉम्बगोळ्यामुळे पक्षाची मोठीच अडचण झाली आहे.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (2142 of 2453 articles)\nनटराजन यांनी हाताळलेल्या फाईल्सची समीक्षा करू\n=केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचे प्रतिपादन= नवी दिल्ली, [३० जानेवारी] - महत्त्वाच्या व संवेदनशील प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी आपल्यावर ‘बाह्य ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%AC-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-18T10:55:46Z", "digest": "sha1:AHPQVRL3FGZSZ7MS64HFZL472L3BK5HV", "length": 16848, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पिंपळेसौदागरमधील सब-वेच्या कामांमुळे नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याची नगरसेवकांची सूचना - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे…\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची…\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Chinchwad पिंपळेसौदागरमधील सब-वेच्या कामांमुळे नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याची नगरसेवकांची सूचना\nपिंपळेसौदागरमधील सब-वेच्या कामांमुळे नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याची नगरसेवकांची सूचना\nचिंचवड, दि. ५ (पीसीबी) – पिंपळेसौदागर येथील गोविंद यशदा चौकात सुरू असलेल्या सब-वेच्या कामाची भाजपचे नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी महापालिकेचे अधिकारी आणि कामाच्या सल्लागारांसोबत मंगळवारी (दि. ५) पाहणी केली. या कामामुळे पादचारी आणि वाहनचालकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी दोघांनीही सूचना करून त्यावर अंमलबजावणी करण्यास अधिकाऱ्यांना सांगितले.\nवाकड ते नाशिक फाटा बीआरटी रस्त्यावर गोविंद यशदा चौकात सब-वे बांधण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीसाठी अडचणी येत आहेत. त्याबाबत अनेक नागरिकांनी महापालिकेच्या सारथीवर तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेऊन नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी महापालिकेचे अधिकारी व कामाच्या सल्लागारांसोबत सब-वेच्या कामाची पाहणी केली.\nसब-वेचे काम सुरू झाल्यानंतर रस्त्यावर वाहतुकीस जास्त जागा उपलब्ध व्हावी याकरिता रस्त्याच्या बाजूने असलेला फुटपाथ काढण्यात आला होता. परंतु, शेजारच्या लिनीअर गार्डनमध्ये नागरिकांना ये-जा करण्यासाठी फुटपाथ नसल्यामुळे कमालीची कसरत करावी लागत होती. याबाबत नागरिकांची तक्रारीची दखल घेत दोन्ही नगरसेवकांनी तातडीने पूर्वी असलेला फुटपाथ पुन्हा बनविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिले. तसेच नागरिकांना स्वराज गार्डन चौकातून फिरून पुन्हा गोविंद यशदा चौकात यावे लागत असल्याने नागरिकांची होणारी वेळ, इंधनाचे नुकसान वाचविण्याच्यादृष्टीने गोल्ड जिमजवळच्या बीआरटीएस बसथांब्याजवळून एक यु-टर्न वळण करण्याच्या सूचना ठेकेदाराला करण्यात आली.\nPrevious articleदत्तगड येथे गरवारे निसर्गप्रेमी ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण\nNext articleनवी सांगवीत आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त गुढी उभारणार\nयमुनानगरमध्ये पालिकेच्या कचरा वेचक ट्रकची तोडफोड\nखासदार आनंदराव अडसूळ यांना अटक करण्यासाठी नवनीत राणांचा धडक मोर्चा\nआरक्षणाची मागणी समस्यांच्या नैराश्यातून\nयवतमध्ये पोलिसांवर दगडफेक; वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर जखमी\nअनुसूचित जमातींमध्ये समावेशासाठी धनगर समाजाचा एल्गार\nअाज शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या स्वतंत्र बैठका; मराठा आरक्षणप्रश्नी भूमिका निश्चित करणार\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nधक्कादायक : किरकोळ कारणावरुन पतीने पत्नीचे नाक करकचून चावून केले जखमी\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nएका वर्षात ७० लाख रोजगाराची निर्मिती\nगोवारी समाज आदिवासी; अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करा – उच्च न्यायालय\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nराष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांना मातृशोक\nआकुर्डीत मंगळवारी मोफत रक्तदान शिबीराचे आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/navaz-sharif-international-news-marathi-news-pakistan-51116", "date_download": "2018-08-18T10:38:11Z", "digest": "sha1:DHFYCANNJKQJQWEKF2CYGHZ2INGE5M75", "length": 11865, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "navaz sharif international news marathi news pakistan अस्तानातील परिषदेला शरीफ उपस्थित राहणार | eSakal", "raw_content": "\nअस्तानातील परिषदेला शरीफ उपस्थित राहणार\nबुधवार, 7 जून 2017\nइस्लामाबाद - कझाकिस्तानातील अस्ताना येथे उद्यापासून (ता. 8) सुरू होत असलेल्या शांघाई सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. या परिषदेवेळी पाकिस्तान आणि भारताला \"एससीओ'चे पूर्ण सदस्यत्व देण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन देशांसाठी ही परिषद महत्त्वाची मानली जाते.\nइस्लामाबाद - कझाकिस्तानातील अस्ताना येथे उद्यापासून (ता. 8) सुरू होत असलेल्या शांघाई सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. या परिषदेवेळी पाकिस्तान आणि भारताला \"एससीओ'चे पूर्ण सदस्यत्व देण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन देशांसाठी ही परिषद महत्त्वाची मानली जाते.\nशांघाई सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या प्रमुखांची ही 17 वी बैठक असून, ती कझाकिस्तानातील अस्ताना येथे 8 व 9 जून रोजी होत आहे. या परिषदेवेळी पाकिस्तान आणि भारताला संघटनेचे पूर्ण सदस्यत्व देण्यात येणार आहे. अस्तानातील परिषदेमध्ये संघटनेचे पाकिस्तानला पूर्ण सदस्यत्व दिले जाणार असल्याची माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आज दिली. पाकिस्तानला हा दर्जा देण्याचा निर्णय संघटनेच्या रशियातील 2015मध्ये झालेल्या बैठकीवेळी घेण्यात आला होता. आत्तापर्यंत पाकिस्तानला \"एससीओ'मध्ये निरीक्षक देशाचा दर्जा होता. या परिषदेवेळी भारताला पूर्ण सदस्यत्व दिले जाणार आहे. भारताचे पंप्रधान नरेंद्र मोदी हे या परिषदेला हजेरी लावण्याची शक्‍यता आहे; मात्र ते शरीफ यांना भेटणार नाहीत, असे भारताकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे.\nपंतप्रधानांकडून केरळसाठी 500 कोटींची मदत जाहीर\nतिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल...\nइस्लामाबाद : 'पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ'चे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांनी आज (शनिवार) पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ...\nसमस्या सोडवण्यासाठी नाशिकला भरणार शिक्षकांचा दरबार\nयेवला - शिक्षकांच्या विविध रखडलेल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी नाशिकमध्ये विभागातील शिक्षकांचा शिक्षक दरबार गुरुवारी (ता.२३) आयोजित करण्यात आला...\nपंतप्रधान मोदी केरळमध्ये दाखल ; पुरपरिस्थितीचा आढावा घेणार\nतिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरात आत्तापर्यंत 300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर कोट्यवधींचे...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/chandrakant-patil-charge-maharashtra-six-days-also-likely-be-leader-agriculture-122778", "date_download": "2018-08-18T10:45:03Z", "digest": "sha1:6CJFX5AQMWWUFMACLFYVFDVERHMZX77C", "length": 13375, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Chandrakant Patil, the 'In-charge' of Maharashtra for six days is also likely to be the leader of the Agriculture चंद्रकांत पाटील सहा दिवसांसाठी महाराष्ट्राचे 'प्रभारी' नायक! | eSakal", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील सहा दिवसांसाठी महाराष्ट्राचे 'प्रभारी' नायक\nरविवार, 10 जून 2018\nकोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत, त्यामुळे त्यांचा प्रभारी पदभार राज्याचे महसूलमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आला आहे. याशिवाय पाटील यांना दिवंगत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे कृषीमंत्री पदही मिळण्याचे सुतोवाच आहेत. त्यामुळे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या वाढदिवसाची विशेष भेट मिळाली असल्याचे कार्यकर्त्यांमूधन बोलले जात आहे.\nकोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत, त्यामुळे त्यांचा प्रभारी पदभार राज्याचे महसूलमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आला आहे. याशिवाय पाटील यांना दिवंगत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे कृषीमंत्री पदही मिळण्याचे सुतोवाच आहेत. त्यामुळे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या वाढदिवसाची विशेष भेट मिळाली असल्याचे कार्यकर्त्यांमूधन बोलले जात आहे.\nआजपासून चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राचे सहा दिवसांसाठी प्रभारी \"नायक' म्हणून पदभार स्वीकारला आहे. शनिवारपर्यंत (ता. 16) ते प्रभारी म्हणून काम पाहतील.\nमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावर्षीच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणाकडूनही फुल, गुच्छ किंवा इतर भेट वस्तू स्विकारणार नसल्याचे जाहीर केले होते. याच गिफ्ट किंवा फुल-गुच्छांऐवजी कोल्हापूर जिल्ह्यात महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्यासाठी देगणी देण्याचे आवाहन केले होते.\nदरम्यान, जिल्ह्यात स्वच्छतागृहांचे काम जोमात सुरू आहे. यातच मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर गेल्यामुळे प्रभारी मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला आहे. कृषीमंत्रीपद मिळण्यासाठी प्रमुख दावेदार असल्याचे समोर येत आहे. महसूलमंत्री पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कोल्हापूरातील संभाजीनगर येथील निवास्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. वाढदिवसासह प्रभारी मुख्यमंत्रीपद मिळल्याने आणि कृषी मंत्रीपद मिळणार म्हणून शुभेच्छा देत आहेत.\nतळेगाव दिघे - बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद\nतळेगाव दिघे (नगर) : मालदाड (संगमनेर) शिवारात शनिवारी पहाटे चारच्या सुमारास मादी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यास...\nKerala Floods : केरळमध्ये मदतीसाठी 38 हेलिकॉप्टर, शेकडो बोटी\nकोची : केरळमध्ये यंदाच्या शतकातील सर्वांत मोठी पूर आला असून, पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी तब्बल 38 हेलिकॉप्टर आणि शेकडो बोटी कार्यरत आहेत...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nभाषणात मोठी ताकद आहे.. : बबन साळगांवकर\nसावंतवाडी : भाषणात मोठी ताकद आहे त्याच वक्तृत्वाचा फायदा घेऊन तब्बल 23 दिवसांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे पहिल्यांदा आमदार बनले आणि त्यांनी नंतर...\nपंकज भूसे यांचा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव\nसरळगांव - महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी होऊन दिलेल्या उद्दिष्टा पेक्षा जास्त वृक्ष लागवड करून उत्कृष्ट कामगिरी केल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/metro-route-work-permission-anil-shirole-121316", "date_download": "2018-08-18T10:59:33Z", "digest": "sha1:MEFACMNCWK66XNAWAERQBT35MPDIEY7S", "length": 11261, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "metro route work permission anil shirole मेट्रो मार्गाच्या कामाला परवानगी देण्याची मागणी | eSakal", "raw_content": "\nमेट्रो मार्गाच्या कामाला परवानगी देण्याची मागणी\nसोमवार, 4 जून 2018\nपुणे - संरक्षण विभागाच्या खडकी येथील जागेवर मेट्रो मार्गाच्या कामाला परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार अनिल शिरोळे यांनी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nपुणे - संरक्षण विभागाच्या खडकी येथील जागेवर मेट्रो मार्गाच्या कामाला परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार अनिल शिरोळे यांनी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nपुण्यात पिंपरी-चिंचवड ते जिल्हा न्यायालय आणि वनाज ते जिल्हा न्यायालय अशा दोन मेट्रो मार्गांचे काम प्रगतिपथावर आहे. पिंपरी-चिंचवडच्या मार्ग संरक्षण विभागाच्या खडकी येथील जागेतून जात आहे. कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील हॅरिस पूल ते रेंजहिल्स डेपो हा सुमारे चार किलोमीटरच्या मार्गाचा यात समावेश आहे. या भागात काम करण्यासाठी संरक्षण विभागाची परवानगी आवश्‍यक आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर या मार्गाचे काम तातडीने सुरू करता येणार असल्याचे या निवेदनात नमूद केले. यासंदर्भात केंद्रीय मंत्री आणि केंद्र सरकारच्या पायाभूत समितीचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली असून, त्यांनीही सकारात्मकता दाखविल्याचे शिरोळे यांनी सांगितले.\nMaratha Kranti Morcha : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री आंदोलन\nपुणे : मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे सोमवारपासून (ता.20) मराठा आरक्षणासाठी आणि विविध मागण्यांसाठी पुणे विभागीय आयुक्त...\n'एक धागा शौर्य' का सैनिकांसाठी जुन्नरच्या विद्यार्थ्यांनीचा अभिनव उपक्रम\nजुन्नर - सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांसाठी जुन्नरच्या शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थिनींनी 'एक धागा शौर्य'का हा अभिनव...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nसंग्रामपूर : वाण धरण ६५ टक्के भरले\nसंग्रामपूर : सातपुडा पर्वतामधील तीन जिल्ह्यांसाठी जलसंजीवनी ठरलेले वाण धरण 65 टक्के भरले आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या ...\nबारामती - विद्या प्रतिष्ठानच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पुरस्कार\nबारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.zpndbr.in/-------------.html", "date_download": "2018-08-18T10:07:11Z", "digest": "sha1:V6EUDC43DWWRYI5XIPZPIA2LCOEEQOWP", "length": 28113, "nlines": 145, "source_domain": "www.zpndbr.in", "title": "बांधकाम विभाग", "raw_content": "\nमहिला व बालकल्याण विभाग\nखात्याकडील सर्व योजनांची माहिती\nअ)योजनाअंतर्गत कामे 3054 रस्ते व पुल.\nस्थानिक क्षेत्र बिगर अनुशेष :- सदर योजनेत येणारे रस्ते हे प्रामुख्याने ग्रामीण व इतर जिल्हा मार्ग संवर्गात असणारे व रस्ते विकास आराखडा सन 1981-2001 व सुधारीत रस्ते विकास आराखडा सन 2001-2021 अंतर्गत समाविष्ट असणारे रस्ते सदर योजनेतून घेणेत येतात.\nस्थानिक क्षेत्र किमान गरजा कार्यक्रम :- किमान गरजा कार्यक्रमांतर्गत 500 व त्यावरील लोकसंख्या असलेली खेडी बारमाही रस्त्याने जोडणे तसेच लोकवस्तीच्या व क्षेत्रफळाच्या प्रमाणात रस्ता लांबी उपलब्ध करणे इत्यादी कामे घेतली जातात.\nआदिवासी विभागातील रस्ते :- आदिवासी विभागात जुन्नर /आंबेगाव खेड व मावळचा काही भाग येतो. त्या भागात देखील वरील निकषा प्रमाणे कामे घेतली जातात. वरील योजनेअंतर्गत कामे घेताना खालील बाबी विचारात घेऊन कामांची अंदाजपत्रके केली जातात. 1.रस्ता सुधारणा 2.नविन रस्त्याचे बांधकाम 3.पुलाची व जलनिस्सारणाची कामे 4.मजबुतीकरण 5.डांबरीकरण इत्यादी\nसदर कामे मंजूर होणेची कार्यपध्दती :- सदर रस्ते प्रामुख्याने स्थानिक आमदार /जिल्हा परिषद पदाधिकारी यांनी सुचविलेनंतर त्या कामांच्या याद्या. मा.अधिक्षक अभियंता यांना सादर केली जातात व त्यांचेमार्फत एकत्रित पुणे जिल्हा परिषदेची यादी शासनाला सादर केली जाते.तदनंतर शासन स्तरावर त्या कामांना मंजूरी प्राप्त होत असते व नंतर सविस्तर अंदाजपत्रके तयार करून जिल्हा परिषदेच्या प्रचर्लित पदधतीने प्रशासकीय मंजूरी घेऊन त्या कामांना तांत्रीक मंजूरी देऊन निविदा कार्यवाही जिल्हा परिषद स्तरावर करणेत येते. निविदा कार्यवाही करताना शासन स्तरावरून अथवा नवीन कार्यपदधतीनुसार जिल्हाधिकारी (नियोजन) यांचेकडून जो नियतव्यय मंजूर केलेला आहे व जे अनुदान प्राप्त झाले आहे. त्याचा विचार करूनच निविदा कार्यवाही करणेत येते.\nब)योजनेत्तर रस्ते वि. दु. करणे कार्यक्रम\nसदर कार्यक्रमात गट अ ब क/ ड/ ई मध्ये वर्गवारी करणेत आलेली आहे.\n3.डोंगरी गटारे खोदणे व सुरळीत राखणे\n4.अस्तित्वातील गटारे खोल करणे.\n7.बाजूपटटया तासणे व योग्य उतार राखणे\n8.उखलेले कटडे, पारापट पूर्ण बांधकाम\n9.किरकोळ स्वरूपात वाहून गेलेल्या भरावाची पुर्नस्थापना\nगट ब विशेष दुरूस्ती :-\n10 रस्त्याची वि.दु. /सुधारणा\n16.कोक ण मराठवाडा विदर्भ विकास कार्यक्रम\n17.अपघात प्रवण क्षेत्राची सुधारणा करणे\n19.कमकुवत तसेच मोठया पुलाची दुरूस्ती\n20.गावे बारमाही रस्त्याने जोडणेसाठी खडीकरण\n21.गावे बारमाही रस्त्याने जोडण्यासाठी मो-यांची कामे\n22.लहान मो-यांची सुधारणा करणे\nगट अ कार्यक्रमातील कामांना कार्यकारी अभियंता यांचे स्तरावर जॉब देणेत येतो व रस्ते विशेष दुरूस्ती ब/ क साठी शासनास ग्रामविकास विभागाकडून जॉब मंजूर करून घेतले जातात.\nक.आमदार /खासदार निधी अंतर्गत करणेत येणारी कामे.\nसदर कामे ही प्रामुख्याने मा.आमदार / खासदार महोदयांकडून यादी निश्चित होऊन ती मा.जिल्हाधिकारी यांना सादर केलेनंतर मा.जिल्हा नियोजन अधिकारी यांचेकडून सदर कामांना प्रशासकीय मंजूरी देऊन अनुदान उपलब्ध केले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने किरकोळ रस्ते /शाळागृह /समाजमंदीर व्यायामशाळा इत्यादी कामे मंजूर केली जातात.\nड.तीर्थक्षेत्र विकास योजना :-\nजिल्हयातील ज्या तीर्थक्षेत्रांना मा.जिल्हा नियोजन व विकास परिषद (डी.पी.डी.सी.) क वर्गीय तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करणेत आले आहे. त्याचा आराखडा तयार करून त्या ठिकाणी आवश्यक त्या नागरीसुखसुविधा शासन निर्णय क्र. 2008 /प्र.क्र. 500 यो 7/ दि. 8/7/2008 अन्वये उदा.शौचालय / स्वच्छतागृहे /भक्तनिवास / वाहन पार्किग /पाणीपुरवठा / पथदिवे / संरक्षक भिंत इत्यादी कामे घेतली जातात. व त्यास उपसमितीची (मा.जिल्हाधिकारी अध्यक्ष, व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सचिव हि समिती) शिफारस घेतलेनंतर त्याची सविस्तर अंदाजपत्रके तयार करून शासनाकडे अनुदान उपलब्धतेसाठी प्रस्ताव सादर करणेत येतात व अनुदान प्राप्त झालेनंतर निविदा कार्यवाही जिल्हा परिषद स्तरावर करणेत येते.\nतीर्थक्षेत्र विकास कामे हाती घेताना खालील निकष लावणेत येतात.\n1) अंदाजपत्रक व आराखडे\n4) जागेबाबत 7/12 अथवा नमुना 8 उतारा\n5) कामे पुर्ण झालेनंतर देखभाल व दुरूस्तीबाबत संबधीत ग्रामपंचायत ठराव / हमीपत्र\n6) प्रस्तावीत काम ज्या जागेत करावयाचे आहे ती जागा देवस्थानच्या मालकीची असल्यास त्याबाबत रू. 100 च्या स्टॅम्प पेपरवर सदरहू जागा ग्रामपंचायत / जिल्हा परिषदेस हस्तांतर करण्याबाबत प्रतिज्ञापत्र\n7) प्रस्तुत काम अन्य कोणत्याही योजनेतून प्रस्तावीत किंवा हाती घेणेत आले नाही याबाबत प्रमाणपत्र\n8) सध्यस्थितीतील देवस्थानासह प्रस्तावीत कामाबाबत नकाशा (Site plan) इत्यादी दस्तऐवज\n9) प्रस्तावीत कामासाठी दरसुची व कामनिहाय प्रति चौ.मी. प्रमाणे येणारा दर / किमंत.\nइ.उर्वरीत महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ :-\nसदर योजनेतून मा.सदस्य सचिव उर्वरीत वैधानिक विकास मंडळाकडून ज्या कामांना शिफारस प्राप्त होते त्या कामांना जिल्हा परिषद स्तरावर सक्षम प्राधिकाराकडून प्रशासकीय व तांत्रीक मंजूरी घेऊन अनुदान उपलब्धतेसाठी सविस्तर अंदाजपत्रके मा.जिल्हाधिकारी (नियोजन शाखा) यांचेकडे सादर करणेत येतात. व त्यांचेमार्फत शासनाकडे प्रस्ताव सादर करणेत येतात.\nअंदाजपत्रकासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.\n1.ग्रामपंचायतीचे मागणी पत्र व ठराव\n2.इतर निधीतून काम घेणेत आले नाही त्या बददलचा दाखला\n3.काम पूर्ण झालेनंतर त्याची दूरूस्ती व देखभाल करणेची जबाबदारी ग्रामपंचायतीची राहिल याबाबतचा ठराव\n5.मंडळाचे मुळ शिफारस पत्र\n7.प्रशासकीय मान्यता / तांत्रिक मान्यता आदेश\nवरील प्रमाणे प्रस्ताव शासनाकडे सादर केलेनंतर त्यास शासनस्तरावरून अनुदान मा.जिल्हाधिकारी (नियोजन शाखा) यांना वितरीत होते व तद्नंतर नियोजन शाखा जिल्हा परिषदेकडे अनुदान वितरीत करून घेऊन पुढील निविदा कार्यवाही जिल्हा परिषद स्तरावर करणेत येते. व नंतर कामे पूर्ण करून घेणेत येतात.\n2515 शासकीय योजना :-\nलोकप्रनिधींनी सुचविलेली कामे ग्रामविकास विभागाकडून मंजूर केली जातात व त्यासाठी शासन स्तरावरून अनुदान उपलब्ध करून दिली जातात.\nसदर कामाचे प्रस्ताव शासनाकडे सादर करणेची कार्यवाही पंचायत शाखेकडून करणेत येते व प्रस्ताव सादर करताना अंदाजपत्रासोबत (उर्वरीत वैधानिक विकास करीता जे निकष) निश्चित केलेली आहे त्याप्रमाणेच प्रस्ताव सादर करावा लागतो. अंदाजपत्रकासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.\n1.ग्रामपंचायतीचे मागणी पत्र व ठराव\n2.इतर निधीतून काम घेणेत आले नाही त्या बददलचा दाखला\n3.काम पूर्ण झालेनंतर त्याची दूरूस्ती व देखभाल करणेची जबाबदारी ग्रामपंचायतीची राहिल याबाबतचा ठराव\n5.मंडळाचे मुळ शिफारस पत्र\n7.प्रशासकीय मान्यता / तांत्रिक मान्यता आदेश\nसन 2013-14 पासून सदर योजना सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेलेली आहे.\nई.8 सार्वजनिक आरोग्य व 12 पशुसंवर्धन विभागाकडील कामे :-\nसंबधीत खातेकडून प्रा.आ.के / उपकेंद्र व निवासस्थांनाची कामांची यादी निश्चित झालेनंतर त्या कामांचे सविस्तर अंदाजपत्रके त्या विभागास सादर केले जातात व त्यांचेकडून प्रशासकीय मान्यता व अनुदान प्राप्त झालेनंतर निविदा कार्यवाही बांधकाम खातेकडून करणेत येते.\nफ.12 वा वित्त आयोग :- सदर लेखाशिर्षातून तीन स्तरावर अनुदान वाटप अर्थविभागाकडून होते\n2.पंचायत समिती स्तर व\nअनुदान वाटप अर्थविभागामार्फत झालेनंतर त्याचे नियोजन त्या त्या स्तरावर होऊन कामांची यादी निश्चित केली जाते. पं.स. व जि.प. स्तरावर यादी निश्चित करताना संबधीत पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य यांना विचारात घेऊन त्यांचेमार्फत सुचविणेत आलेली कामे सदर निधीतून करणेत येतात. 12 वा वित्त आयोगअंतर्गत शासन स्तरावर देखील रस्ते दूरूस्ती साठी अनुदान उपलब्ध होते. व त्यानुसार कामे हाती घेतली जातात. सदर कार्यक्रम शासन स्तरावर मंजूर केला जातो.\nड.जिल्हा परिषद निधीतील विविध विकास कामे\nहया लेखाशिर्षांतर्गत विविध विकास कार्यक्रमांतर्गत\n2.इमारती दुरूस्ती व देखभाल\n5.विश्रामगृह दुरूस्ती कामे हाती घेतली जातात.\nखातेस उपलब्ध असलेल्या निधीतून मागील वर्षाच्या अपूर्ण कामांना लागणारा निधी वजा जाता शिल्लक निधीचे नियोजन करून नवीन कामे मा.सदस्य / मा.पदाधिकारी यांचे सुचनेनुसार घेतली जातात व अनुदान उपलब्धतेनुसार सदर कामांना सक्षम प्राधिकारांची मान्यता घेऊन व त्यास तांत्रीक मंजूरी देऊन निविदा कार्यवाही केली जाते. (यामध्ये साधारण रस्ते /एस.टी.थांबे /समाजमंदीर /व्यायामशाळा /सभामंडप व नविन किरकोळ लांबीचे रस्ते व असणार रस्त्याची वि.दु. करणे इत्यादी कामे घेतली जातात.) ठक्कर बाप्पा योजनाअंतर्गत येणारी कामे :- सदर योजना प्रामुख्याने आदिवासी क्षेत्राकरीता आहे.\nत्याचे निकष खालीलप्रमाणे आहेत जून्नर /आंबेगाव /खेड हया तीन तालुक्यातील आदीवासी क्षेत्र व मावळ तालुक्यातील काही गावांचा यामध्ये समावेश आहे. सदर योजना सन 2004-05 हया वर्षापासून चालु झालेली आहे. परंतु प्रत्यक्षात शासन निर्णय दि. 26/6/2007 पासून सदर योजना विस्तारीत स्वरूपात अंमलात आणणेसाठी दिलेली आहे.\n1.1000 पेक्षा जादा आदिवासी लोकसंख्या असेल तर र.रू. 15.00 लक्ष पर्यंंतची कामे घेता येतात.\n2.500 ते 999 आदीवासी लोकसंख्या असलेस रू. 10.00 लक्ष पर्यंतची कामे घेता येतात.\n3.499 पेक्षा कमी आदीवासी लोकसंख्या असेल तर र.रू. 5.00 लाखापर्यतची कामे घेता येतात.\n4.एका वर्षात जास्तीत जास्त दोन कामे घेता येतात व एका गावासाठी दोन्ही कामांची जास्तीत जास्त मर्यादा रू. 25.00 लक्ष एवढी असते\n2.पिण्याचे पाण्याची सोय करणे\n3.शाळागृहाचे कंपाऊड /समाजमंदीर /मंगल कार्यालय /वाचनालय व्यायामशाळा स्मशानभूमी /सार्व शौचकूप व मुतारी इत्यादी.\nसदर योजनांना प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प घोडेगाव यांचेकडून मान्यता मिळत असते.\nरोजगार हमी योजना :-\nमंजूर उपलब्धतेनुसार तहसीलदार यांचेकडून कामांची मागणी प्राप्त होताच सदरचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करणेत येतो. व त्यांचेकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त होताच पुढील कार्यवाही करणेत येते.\nप्रशासकीय मंजूरी व निविदा मंजूरीचे अधिकारी खालीलप्रमाणे आहेत.\nशासन निर्णय क्र. झेड/वीरा/2012/प्र.क्र. 680/वित्त 9 दि. 19/3/2012\n3.अति मुख्य कार्यकारी अधिकारी / मुख्य कार्यकारी अधिकारी ---------10.00 लक्ष ते 20.00 लक्ष\nबांधकामविषयक कामे :- 1.मुळ कामासाठी र.रू. 100.00 लक्षपर्यंत\nकार्यकारी अभियंता :- 2.दूरूस्ती कामासाठी रक्कम रू. 5.00 लक्ष पर्यंतचे अधिकार\nसार्वजनिक नावा :- पुणे जिल्हयातील आठ धरणातील व धरणाचे पाणलोट क्षेत्रातर्गत जलाशयातील ग्रामस्थांचे दळणवळणासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या मालकीच्या प्रवाशी मोटर लॉच द्वारे सेवा पुरविणेत येते. सदरची सेवा ग्रामीण, गरीब, तसेच आजारी रूग्ण, विद्यार्थी यांची दळणवळणाची निकड लक्षात घेऊन पुरविली जाते. सदर प्रवाशी लॉचसाठी दैनंदिन इंधनाचा खर्च तसेच दुरूस्ती देखभालीचा खर्च जि.प. निधीमधील सार्वजनिक नावा या सदरातून करण्यात येतो. सदर लॉचवर शासनाकडून कोणताही कर्मचारी आकृतीबंध मंजूर नसल्याने सदरची पदे (लॉच चालक, कंन्डक्टर, मॅकेनिक, वॉचमन) जि.प. ला भरता येत नाहीत परंतु ग्रामस्थांची दळणवळणाची निकड लक्षात घेवून सदर लॉच जि.प. कडील चतुर्थ कर्मचारी परिचर /मैलकामगार यांना अल्पमुदतीचे मर्कंटाईल मरीन डिपार्टमेंट मुंबई यांचेकडील प्रशिक्षण देवून चालविण्यात येत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2013/12/", "date_download": "2018-08-18T10:50:39Z", "digest": "sha1:WZF2K2TY24QVOUEMJOH7TLSEFFIKU2JS", "length": 6623, "nlines": 171, "source_domain": "kayvatelte.com", "title": "December | 2013 | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nहा शब्द ऐकला की पूर्वी मला डाय + ईटींग म्हणजे “खाऊन खाऊन मरा”…डायटींग असे वाटायचे 🙂 एखादा माणूस डायटींग करतोय हे ऐकले की मला फुड व्हर्सेस मॅन चा एपिसोड नजरेसमोर यायचा.माझं वजन हे नेहेमीच यो-यो प्रमाणे खाली वर होत असते. … Continue reading →\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nसिक्रेट मेसेज कसा पाठवायचा\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2018-08-18T10:57:03Z", "digest": "sha1:T65B5VKAD377KZAUEEDE6IRLWL5UHITQ", "length": 16703, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मराठा समाजाचे सर्व्हेक्षण करण्याचा प्रयत्न उधळून लावू – निलेश राणे - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे…\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची…\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Maharashtra मराठा समाजाचे सर्व्हेक्षण करण्याचा प्रयत्न उधळून लावू – निलेश राणे\nमराठा समाजाचे सर्व्हेक्षण करण्याचा प्रयत्न उधळून लावू – निलेश राणे\nरत्नागिरी, दि. ३० (पीसीबी) – एखाद्या खासगी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाचे सर्व्हेक्षण करण्याचा प्रयत्न सरकार करणार असेल, तर तो आम्ही मान्य करणार नाही, तो उधळून लावू,असा इशारा देऊन आरक्षणाबाबत राणे समितीने २०१४ मध्ये सादर केलेल्या अहवालावर निर्णय घेण्यात यावा, असे माजी खासदार नीलेश राणे यांनी म्हटले आहे.\nराणे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत सरकारने आयोगाची स्थापना केली असेल. तर त्यातील सदस्यांची नावे जाहीर करावी लागतील. खेर्डी (ता. चिपळूण) येथील मराठा कुटुंबांचे काही लोकांकडून अर्ज भरून घेतले जात असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत काही लोकांच्या आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत. अर्ज भरून घेणाऱ्यांची काहीही माहिती समजलेली नाही. त्यांचा कर्ताकर्विता कोण हेही माहीत नाही. भरून घेतलेले अर्ज सरकारी नाहीत. त्या कुटुंबांची यादी त्यांनी मोबाईलमध्ये ठेवलेली आहे. अशा प्रकारचे सर्व्हेक्षण होत असेल तर ती भयावह गोष्ट आहे, असे राणे म्हणाले.\nअर्जातील काही माहिती पेनने आणि काही माहिती पेन्सिलीने भरावयाची आहे. पेन्सिलीने भरलेली माहिती खोडून अन्य नोंदी करता येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकारे लोकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्या अर्जामध्येही विचित्र माहिती भरून घेतली जात आहे. आपल्या येथे बळी दिला जातो का, विंचू चावल्यास औषधोपचारासाठी कोणाकडे जाता अशा प्रश्‍नांचा आणि आरक्षणाचा संबंधच येत नाही. त्यामुळे आरक्षण न देण्यासाठी सुरू असलेली ही खेळी असू शकते, असे नीलेश यांनी म्हटले आहे.\nPrevious articleऔरंगाबादमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विवाहीत तरुणाची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या\nNext articleमराठा समाजाचे सर्व्हेक्षण करण्याचा प्रयत्न उधळून लावू – निलेश राणे\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घाेषणा\nहिम्मत होती तर एकेकाने यायचे होते मग दाखवले असते; औरंगाबादेतील एमआयएम नगरसेवकाचा माज\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nकॉसमॉस बँकेची आर्थिक स्थिती उत्तम- अध्यक्ष\nमराठा आंदोलनात स्फोट घडवण्याचा कट; हिंदुत्ववादी अतिरेक्यांच्या चौकशीतून उघड\nहॅकरने असे केले पुण्यातील कॉसमॉस बँकेतून ९४ कोटी गायब; व्हिसा कंपनीमुळे...\nशहीद मेजर कौस्तुभ राणे यांना गौरव पुरस्कार\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nसंभाजी भिडेंना रोखा; नाहीतर महाराष्ट्राचा कठुआ व उन्नाव होईल- तुषार गांधी\nकेलेल्या चुकीचा पश्चाताप होतो – संजय दत्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://diamondbookspune.com/viewdetails.php?bid=925&cat=%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2018-08-18T09:58:01Z", "digest": "sha1:2J5BATP7O5Q44DCLPODIHM72L33KKA5E", "length": 6110, "nlines": 73, "source_domain": "diamondbookspune.com", "title": "Welcome to Diamond Publications", "raw_content": "\nशारीरिक शिक्षण व खेळ\nBook Name : काळी मांजर - एडगर अॅलन पो च्या निवडक गूढकथा 20 %\nAuthor : एडगर अॅलन पो\nमाझ्या काठीच्या टकटकीचा आवाज त्या शांत तळघरात विरून जातोय न् जातोय, तोच त्या भिंतीतल्या थडग्यातून उलट आवाज आला एखादं बाळ रडल्यासारखा तो आवाज पहिल्यांदा घुसमटल्यासारखा आणि तुटक तुटक होता. मग अचानक तो मोठा मोठा होत एक लांबलचक भेसूर किंकाळी ऐकू आली. कोणीतरी ओरडत होतं किंवा रडल्यासारखं किंचाळत होतं. त्या आवाजात भीती होती, पण एक प्रकारचा विजयी आनंदसुद्धा होता. खितपत पडलेल्या दुःखी आत्म्यांचं रडणं आणि त्यांचा छळ करणार्‍या असुरांचा राक्षसी आनंद याचं मिश्रण असलेली अशी भयंकर किंकाळी फक्त नरकातूनच ऐकू येऊ शकते एखादं बाळ रडल्यासारखा तो आवाज पहिल्यांदा घुसमटल्यासारखा आणि तुटक तुटक होता. मग अचानक तो मोठा मोठा होत एक लांबलचक भेसूर किंकाळी ऐकू आली. कोणीतरी ओरडत होतं किंवा रडल्यासारखं किंचाळत होतं. त्या आवाजात भीती होती, पण एक प्रकारचा विजयी आनंदसुद्धा होता. खितपत पडलेल्या दुःखी आत्म्यांचं रडणं आणि त्यांचा छळ करणार्‍या असुरांचा राक्षसी आनंद याचं मिश्रण असलेली अशी भयंकर किंकाळी फक्त नरकातूनच ऐकू येऊ शकते विचक्षण वाचकांमध्ये पो त्याच्या लघुकथांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. त्याने लिहिलेल्या रहस्यकथा आणि गूढकथा केवळ रहस्य किंवा गूढ उकलणार्‍या नसतात, तर या कथांमध्ये मानसशास्त्रीय मर्मं दडलेली असतात. माणसाच्या नेणिवेत दडलेल्या अनाकलनीय आणि अतर्क्य गोष्टी पो आपल्या कथांमधून समोर आणतो. या कथांमधून पो आपल्याला त्याच्या अलौकिक आणि अद्भुत विश्वात घेऊन जातो. या गुंगवून टाकणार्‍या कथांमध्ये केवळ भय आणि रहस्य नाही; त्यांच्यात उपहास आणि विनोदही आहे. तसंच मानवी प्रवृत्तींवर केलेलं भाष्यही आहे. म्हणूनच एवढा मोठा काळ लोटूनसुद्धा आजही या कथा मौलिक ठरतात.\nसमाजशास्त्र ललित अर्थशास्त्र वाणिज्य-व्यवस्थापनशास्त्र\nइतिहास व्यक्तिमत्त्व विकास चरित्रे-आत्मचरित्रे पत्रकारिता-प्रसारमाध्यमे\nराज्यशास्त्र कविता संग्रह भूगोल धार्मिक\nमानसशास्त्र मराठी साहित्य पर्यावरण ग्रंथालय-माहितीशास्त्र\nस्पर्धा परीक्षा बाल-कुमार वाङमय आपत्ती व्यवस्थापन संगीत\nआरोग्य क्रमिक पुस्तके नाटकं आयुर्वेद\nअनुवादित पुस्तके बेस्टसेलर्स विज्ञानविषयक ज्योतिष\nकथा कोशवाङमय शिक्षणशास्त्र English Literature\nकादंबरी स्त्रीविषयक शारीरिक शिक्षण व खेळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-18T10:54:06Z", "digest": "sha1:R4FNDJNYG5Q5CILSRKKTMPEWUPRBAPP6", "length": 9790, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मेट्रोच्या अहवालासाठी चार कोटींचा खर्च | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमेट्रोच्या अहवालासाठी चार कोटींचा खर्च\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने पिंपरी ते निगडी आणि नाशिक फाटा ते चाकण या मार्गावर मेट्रो सुरू करण्याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. हा डीपीआर तयार करण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यासाठी तब्बल 4 कोटी 31 लाख रूपये पुणे महामेट्रोला देण्यात येणार आहेत.\nपिंपरी ते निगडी आणि नाशिक फाटा ते चाकण या मार्गावर मेट्रो सुरू करण्याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करावा. तसेच नाशिक फाटा ते खेड या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात मेट्रोसाठी जागा ठेवून काम करावे, अशी लोकप्रतिनिधींची मागणी आहे. महापालिकेतील विविध प्रश्नांबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कार्यालयात आमदार आणि महापालिका पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली. या बैठकीस महाराष्ट्र मेट्रोरेल कॉर्पोरेशन आणि राष्ट्रीय राज मार्ग प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पिंपरी ते निगडी आणि नाशिक फाटा ते चाकण हा मेट्रो मार्ग वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली. या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याबाबत मेट्रो रेल कॉर्पोरेशनला सुचना देण्यात आल्या. तसेच महापालिकेमार्फत मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र पाठवून डीपीआर तयार करण्याचा खर्च महापालिका देणार असल्याबाबत कळविण्यात आले.\nमहामेट्रोच्या कार्यकारी संचालकांनी पुणे मेट्रो रेल प्रकल्पाच्या भाग दोनसाठी डीपीआर तयार करण्यासाठी सिस्ट्राईकॉम-इजिस-राईटस या संस्थेची सेवा घेण्यात येत असून डीपीआर तयार करण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याबाबत कळविले. तसेच या दोन्ही मार्गावर मेट्रो सुरू करण्यासाठी मेट्रो मार्गाचे डीपीआर तयार करण्यासाठी 3 कोटी 84 लाख अधिक 12 टक्के जीएसटी म्हणजेच 4 कोटी 31 लाख रूपये खर्च अपेक्षित असल्याचे नमुद केले. ही रक्कम महामेट्रोकडे वर्ग करण्याबाबत कळविले. ही रक्कम महापालिकेच्या सन 2018-19 च्या अर्थसंकल्पातील केंद्र सरकार पुरस्कृत योजना आणि युटीएफ लेखाशिर्षावरील 50 कोटी तरतुदीमधून देता येईल. त्यानुसार, महामेट्रो यांना 4 कोटी 31 लाख रूपये थेट पद्धतीने करारनामा न करता महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार देण्यात येणार आहे. हा प्रस्ताव आगामी स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकोंढापुरीत बसमधून पावणेनऊ लाखांचे दागिने लंपास\nNext articleकठुआ बलात्कार-हत्या प्रकरणी आजपासून कोर्टात सुनावणी\nपादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा\n“आषाढघन’ काव्‍यसुमनांच्‍या वर्षावात रसिक चिंब\nVideo : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात आगमन\nशहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल\nपालखीसोबत 225 जणांची सायकलवारी\nवारीतील भाविकांना आरोग्य सुविधा पुरवण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-who-will-get-loan-waiver-53248", "date_download": "2018-08-18T10:34:32Z", "digest": "sha1:KBAFR5I5KRHGD4J3GQHOUFPUMHF3OIR3", "length": 16562, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news Who will get loan waiver? कर्जमाफी मिळणार तरी कुणाला? | eSakal", "raw_content": "\nकर्जमाफी मिळणार तरी कुणाला\nशनिवार, 17 जून 2017\nकोल्हापूर - राज्य शासनाने कर्जमाफीपूर्वी थकबाकीदारांना दहा हजार रुपये देण्यासाठी लावलेले निकष बघितले तर ही कर्जमाफी मिळणार तरी कोणाला असाच प्रश्‍न उपस्थित होत आहे. कर्जमाफी द्यायची आहे; पण ती मिळणार नाही, अशीच व्यवस्था थकबाकीदाराला प्रत्येकी दहा हजार रुपये देण्यासाठी काढलेल्या आदेशातील अटींवरून पुढे येत आहे.\nकोल्हापूर - राज्य शासनाने कर्जमाफीपूर्वी थकबाकीदारांना दहा हजार रुपये देण्यासाठी लावलेले निकष बघितले तर ही कर्जमाफी मिळणार तरी कोणाला असाच प्रश्‍न उपस्थित होत आहे. कर्जमाफी द्यायची आहे; पण ती मिळणार नाही, अशीच व्यवस्था थकबाकीदाराला प्रत्येकी दहा हजार रुपये देण्यासाठी काढलेल्या आदेशातील अटींवरून पुढे येत आहे.\nराज्य शासनाने सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला. या निर्णयाचे निकष, त्यासाठी करावी लागणारी तरतूद याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली नाही. या मंजुरीनंतर अधिवेशनात हा विषय येणार. तोपर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांची अडचण सोडवण्यासाठी त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या कर्जाला शासनाची हमी आहे. कर्जमाफीचे निकष ठरलेले नाहीत; पण हे दहा हजार कोणाला द्यायचे, याचे निकष मात्र यासंदर्भात काढलेल्या आदेशात नमूद आहेत. हे निकष पाहता कर्जमाफीचे हे दहा हजार रुपयेही कोणाला मिळतील का नाही, अशी शंका आहे. प्रत्यक्ष कर्जमाफीच्या आदेशातही हेच निकष असतील. त्यामुळे ही कर्जमाफी कोणाला मिळणारच नाही, अशी व्यवस्था केली असल्याचे दिसून येते.\nसरकारला कर्जमाफी द्यायची आहे; पण त्यात बुडवे, गर्भश्रीमंत बसू नयेत, हा चांगला हेतू आहे; पण आदेश काढताना कर्जमाफी कोणाला मिळणार नाही, याची यादी जाहीर केली आहे. त्यात आजी-माजी आमदार, खासदार, मंत्री यांच्याबरोबरच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचाही उल्लेख आहे. ज्यांना कर्जमाफीची गरज नाही त्यांना ती मिळूच नये; पण एखाद्या आरक्षित गटातून जिल्हा परिषदेवर गरीब कार्यकर्ता निवडून आला असेल तर त्याला कर्जमाफी मिळणार नाही. तो फक्त जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्याचा हक्क डावलणे योग्य आहे का कुटुंबात एकाला जरी सरकारी, निमसरकारी नोकरी असेल तर त्या कुटुंबाला याचा लाभ मिळणार नाही, असे म्हटले आहे; पण आता एकत्रित कुटुंब पद्धतीला छेद दिला जात आहे. सरकारी नोकरीत असलेला कुटुंबातील सदस्य घराबाहेर राहत असेल तर त्या कुटुंबाचा दोष काय कुटुंबात एकाला जरी सरकारी, निमसरकारी नोकरी असेल तर त्या कुटुंबाला याचा लाभ मिळणार नाही, असे म्हटले आहे; पण आता एकत्रित कुटुंब पद्धतीला छेद दिला जात आहे. सरकारी नोकरीत असलेला कुटुंबातील सदस्य घराबाहेर राहत असेल तर त्या कुटुंबाचा दोष काय अशी विचारणा होत आहे.\nफायनान्स कंपन्या आता शून्य टक्के डाऊनपेमेंटवर चारचाकी गाड्या देत आहेत. एक लाखापर्यंतची गाडी एखाद्या शेतकऱ्याने या योजनेतून घेतली तर तोही अपात्र ठरणार आहे. मग शेतकऱ्यांनी चारचाकी घ्यायची नाही का, असाही प्रश्‍न उपस्थित होतो. एकूणच ही कर्जमाफी म्हणजे सरकारला द्यायची आहे; पण ती मिळणार नाही, अशीच व्यवस्था केल्याचे बोलले जाते.\nशासनाने कर्जमाफीतील दहा हजार रुपये देण्यासाठी काढलेल्या या आदेशाची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. एकाच घरात चार-पाच सरकारी नोकरदार असतील तर त्यापैकी एकालाच तुम्ही सातव्या वेतन आयोगाचा लाभ देणार का हा प्रश्‍न शेतकरी विचारत असल्याचा हा संदेश फिरत आहे.\nयांना मिळणार नाही लाभ\nआजी-माजी आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरपालिका, महापालिकेतील नगरसेवक, शासकीय, निमशासकीय नोकरीतील कर्मचाऱ्यांचे कुटुंब, शिक्षक, प्राध्यापकांचे कुटुंब, प्राप्तिकर भरणारे, डॉक्‍टर, वकील, चार्टर्ड अकौंटंट, अभियंते, सर्व शासकीय ठेकेदार, सहकारी संस्थांचे संचालक, अधिकारी, ज्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी आहे, असे कुटुंब, दुकानाचा परवाना असलेली व्यक्ती (दुकान बंद असले तरी) यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही.\nसिद्धूचे पाक लष्करप्रमुखांना अलिंगन\nनवी दिल्ली : पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला काँग्रेसचे नेते व भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांना खास आमंत्रण होते....\nKerala Floods : केरळमध्ये मदतीसाठी 38 हेलिकॉप्टर, शेकडो बोटी\nकोची : केरळमध्ये यंदाच्या शतकातील सर्वांत मोठी पूर आला असून, पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी तब्बल 38 हेलिकॉप्टर आणि शेकडो बोटी कार्यरत आहेत...\n'एक धागा शौर्य' का सैनिकांसाठी जुन्नरच्या विद्यार्थ्यांनीचा अभिनव उपक्रम\nजुन्नर - सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांसाठी जुन्नरच्या शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थिनींनी 'एक धागा शौर्य'का हा अभिनव...\nचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://shatadapremkarave.blogspot.com/2008/03/blog-post_6734.html", "date_download": "2018-08-18T10:48:31Z", "digest": "sha1:H7MSKRO7NTNOL5O6QDE4AKEPNR3RH5WF", "length": 3322, "nlines": 67, "source_domain": "shatadapremkarave.blogspot.com", "title": "शतदा प्रेम करावे: प्रेम", "raw_content": "\nनमस्कार मित्रानो. मी अनिल बिहाणी . मझ्याबाबातीत सांगण्यासारखे विशेष काहिच नाहि.मी एक् सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य मुलगा आहे.पण प्रत्येक समान्यात कुठे तरि असामन्यत्व द्डलेलं असतं.माझ्यातल्या या असामान्यत्वाचा शोध् घेणे सद्या सुरु आहे.\nतुला मदत करता करता\nव्हायचं तुमचं लुटुपुटीचं भांडण\nअन् मग तुमचं ते रुसणं फूगणं\nमीच बनायचे मग मध्यस्थ\nअन् द्यायचे तुमचे हात एकमेकांच्या हातात\nजायचो आपण डोंगरदऱ्यात फिरायला\nअन् मग तुम्हाला एकांतात सोडून\nखिळवायची मी नजर पुस्तकाच्या पानावर\nतिचं ते माझ्या नावावर घराबाहेर पडणं\nतुमचं ते फिरायला जाणं\nमाझं मग बागेतल्या कोपऱ्यात\nशून्यात नजर लावून तुमची वाट पहाणं\nदेत आहोत आपणच आपल्या प्रेमाची आहूती\nपण दुसऱ्याच क्षणी उमगायचं\nप्रेम् असतं फ़क़्त देण्यासाठी\nधडपडूच नये ते आपलेसं करण्यासाठी .\nजय हो तेरी गोविंदा ......\nही वाट दूर जाते .......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-raju-shetty-jet-airwayss-mistake-52557", "date_download": "2018-08-18T10:47:24Z", "digest": "sha1:5YY4QBC5A7N5KCOZDLDYYXPNTB3TOINL", "length": 14554, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai news Raju Shetty Jet Airways's mistake जेट एअरवेजच्या चुकीमुळे राजू शेट्टींना मन:स्ताप | eSakal", "raw_content": "\nजेट एअरवेजच्या चुकीमुळे राजू शेट्टींना मन:स्ताप\nबुधवार, 14 जून 2017\nमी आज मुंबई विमानतळ येथे सकाळी 6.00 वाजताच्या विमानाचे दिल्ली येथे जाण्यासाठी बिझनेस क्लासचे तिकीट घेतले व तास भर आधी विमानतळावर पोहोचलो. रितसर बोर्डिंग पास घेतला व वेळ होता म्हणून लाउंजमध्ये बसलो होतो. त्यावेळी रजिस्टरमध्ये नोंद देखील मी केली. काही वेळाने मी बोर्डिंग करता लॉन्जच्या बाहेर आलो असता, बोर्डिंगचा दरवाजा बंद झाल्याचे मला कळवण्यात आले.\nमुंबई- खासदार राजू शेट्टी आज मुंबईहून दिल्लीला निघाले होते. त्यासाठी त्यांनी मुंबई विमानतळावर 'बोर्डिंग पास' घेतला असताना त्यांना घेऊन जाण्यास जेट एअरवेज विसरले. त्यानंतर अरेरावी करत जेट एअरवेजच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला मन:स्ताप दिल्याने तक्रार करणार असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी 'सरकारनामा'ला दिली.\nखासदार शेट्टी म्हणाले, ''मी आज मुंबई विमानतळ येथे सकाळी 6.00 वाजताच्या विमानाचे दिल्ली येथे जाण्यासाठी बिझनेस क्लासचे तिकीट घेतले व तास भर आधी विमानतळावर पोहोचलो. रितसर बोर्डिंग पास घेतला व वेळ होता म्हणून लाउंजमध्ये बसलो होतो. त्यावेळी रजिस्टरमध्ये नोंद देखील मी केली. काही वेळाने मी बोर्डिंग करता लॉन्जच्या बाहेर आलो असता, बोर्डिंगचा दरवाजा बंद झाल्याचे मला कळवण्यात आले. बोर्डिंग पास घेतलेला असतानाही असे विसरून जाणे, हा विमान कंपनीचा हलगर्जीपणा असल्याचे मी निदर्शनास आणून दिले. मात्र, जेट एअरवेज कंपनीने सरळ हात वर केले.''\nते पुढे म्हणाले, ''मला दिल्लीला बैठकीसाठी करता जाणे जरूरी असल्याने पर्यायी व्यवस्था करण्याची विनंती केली. त्यानंतर सकाळी 7.00 वाजताच्या विमानाचे बदली तिकीट दिले. मात्र, या करता 2000 रूपये वसुल केले. माझी चूक नसल्याने मी पैसे भरण्यास नकार दिला असता जेट एअरवेज ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी कार्डद्वारे मी पैसे दिले व त्याची पावती मागितली असता कंपनीने मला पावतीही दिली नाही.'' आपली चूक नसताना झालेल्या मन:स्तापाबद्दल 'एयरपोर्ट अॅथाॅरिटी' कडे तक्रार करणार आल्याचेही शेट्टी यांनी यावेळी सांगितले.\nदरम्यान, विमानतळावरील अधिकारी व शिवसेना खासदार रवी गायकवाड यांच्या भांडणाचे प्रकरण ताजे असतानाच आता खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत गैरवर्तवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई होते हे पहावे लागेल. खासदार राजू शेट्टी कधीही 'प्रोटोकॉल' घेत नाहीत, तसेच मदतनीस देखील घेत नाहीत. त्यामुळेच त्यांना हा नाहक मन:स्ताप सहन करावा लागला असल्याची माहिती स्वाभिमानीचे प्रवक्ते योगेश पांडे यांनी दिली.\nसरकारनामावरील आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा -\nश्रीमंत शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या रांगेतून जरा बाजूला सरकावे\nनारायण राणेंचा भाजप प्रवेश निश्चित..\nउत्तरप्रदेशचा 'फॉर्म्युला' शिवसेनेला मान्य नाही : संजय राऊत​\nविधान परिषद सभापती रामराजेंना खासदारकीचे वेध​\nदर्डांचे निकटवर्तीय मनोज जयस्वाल यांना अटक​\nMaratha Kranti Morcha : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री आंदोलन\nपुणे : मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे सोमवारपासून (ता.20) मराठा आरक्षणासाठी आणि विविध मागण्यांसाठी पुणे विभागीय आयुक्त...\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून सहाजण जखमी\nबेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने बंगळूरकडे जाणारी व्हीआरएलची आराम बस उलटून चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय...\nघरकामगार, बांधकाम मजूर महिलांची उपेक्षाच\nजळगाव : दिवसरात्र काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, पण डोक्‍यावर हक्काचं छत नाही...सतत कष्ट करूनही पदरी काहीच न पडल्यामुळे अनेकदा उपवास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/jagtap-suicides-have-increased-custody-accused-122229", "date_download": "2018-08-18T10:28:18Z", "digest": "sha1:DJTE2LDUQO6NLG2OZNE2PU32DDNJZ2TT", "length": 11315, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Jagtap suicides have increased in the custody of the accused जगताप आत्महत्येप्रकरणी आरोपींच्या कोठडीत वाढ | eSakal", "raw_content": "\nजगताप आत्महत्येप्रकरणी आरोपींच्या कोठडीत वाढ\nशुक्रवार, 8 जून 2018\nपुणे - सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक केलेल्या पाच आरोपींच्या पोलिस कोठडीत 11 जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, जितेंद्र जगताप यांच्या कार्यालयातून मृत्यूपूर्व लिहिलेली आणखी एक चिठ्ठी पोलिसांना प्राप्त झाली आहे.\nपुणे - सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक केलेल्या पाच आरोपींच्या पोलिस कोठडीत 11 जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, जितेंद्र जगताप यांच्या कार्यालयातून मृत्यूपूर्व लिहिलेली आणखी एक चिठ्ठी पोलिसांना प्राप्त झाली आहे.\nयाप्रकरणी जयेश जितेंद्र जगताप (वय 28, रा. घोरपडे पेठ) यांनी लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दिली होती. जगताप यांनी शनिवारी घोरपडीतील लोहमार्गावर रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. जगताप यांच्या आत्महत्येस जबाबदार असल्याप्रकरणी पोलिसांनी विनोद रमेश भोळे (वय 34, रा. घोरपडी पेठ, जोशीवाडा), सुधीर दत्तात्रय सुतार (वय 30, रा. जयभवानीनगर, कोथरूड), अमित उत्तम तनपुरे (वय 28, मांडवी खुर्द, ता. हवेली), अतुल शांताराम पवार (वय 36, रा. शांतीनगर, येरवडा) आणि विशांत श्रीरंग कांबळे (वय 30, रा. येरवडा) यांना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान, गुरुवारी कोठडी संपत होती. त्यानंतर तपासासाठी पोलिस कोठडी वाढविण्याची मागणी सरकारी पक्षाने केली होती.\nपिंपरी - दोन मुलांना मारून वडिलांची आत्महत्या\nपिंपरी (पुणे) - दोन मुलांना मारून वडिलांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना शनिवारी दुपारी ताथवडे येथे घडली. शुभम बर्मन (वय १०) रूपम वर्मा (वय...\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण...\nपुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार\nपुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या...\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा...\nउंड्री - पाचव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजूर ठार\nउंड्री - गुलाम अली नगर गल्ली नं 6 दि.13 ऑगस्ट दु.12.30 वाजता एका निर्माणाधीन इमारतीचे काम सुरू असताना पाचव्या मजल्यावर पडून राजशेखर माशाले (वय 33...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-18T10:54:38Z", "digest": "sha1:YCJFI6W4C7HHI3ZDYDH4FLXMCEAY6743", "length": 16747, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "कोढव्यातील मुंडके नसलेल्या धडाच्या खूनाचा उलघडा करण्यात पोलिसांना यश - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे…\nपिंपळेगुरवमध्ये रविवारी पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त स्नेहमेळाव्याचे आयोजन\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची…\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Pune कोढव्यातील मुंडके नसलेल्या धडाच्या खूनाचा उलघडा करण्यात पोलिसांना यश\nकोढव्यातील मुंडके नसलेल्या धडाच्या खूनाचा उलघडा करण्यात पोलिसांना यश\nपुणे, दि. २२ (पीसीबी) – कोढव्यातील राजपाल बिल्डर यांच्या मोकळ्या प्लॅाटवर कंपाऊंड लगतच्या खड्यात मंगळवारी (दि.१९) एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला होता. खून केल्या नंतर आरोपीने मृताची ओळख पटू नये म्हणून मुंडके कापू नेले होते. या थरारक खूनाचा उलगडा करण्यात परिमंडळ चारच्या पोलिसांना यश आले आहे.\nउमेश भिमराव इंगळे (वय २०, रा. अण्णाभाऊ साठे नगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी निजाम अजगर हाशमी (वय १८, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) या तरुणाला अटक केली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि.१९) कोढव्यातील राजपाल बिल्डर यांच्या मोकळ्या जागेत असलेल्या खड्यात एक मुंडके नसलेला पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच कोढवा पोलिसांनी घटना स्थळाची पाहनी करुन, मृतदेहाचे वर्णन करुन त्याबद्दलची माहिती कोणाला असल्याची ती द्यावी असे आवाहन केले होते. यावर या मृतदेहाशी सामय असलेली एक मिसींगची तक्रार बिबवेवाडी येथील सिमा हनुमंत इंगळे आणि त्यांचा जावाई गणेश खिल्लारे यांनी दिली होती. यावर त्यांकडे चौकशी केली असता मृत तरुण शनिवार (दि.१६) अप्पर रोड बिलाल मस्जिद जवळील फिटनेस फॉरएव्हर जिम येथील मिसिंग असल्याचे कळले. तसेच तो शेवटी आरोपी निजाम हाशमी सोबत दिसल्याचे त्यांनी पोलिसांनी सांगितले. यावर पोलिसांनी निजाम याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता निजाम याचे उमेश याच्या एका नात्यातील मुलीशी प्रेम संबंध होते. त्यामुळे त्या दोघांमध्ये सारखी भांडणे व्हायची यामुळे उमेशचा खून केल्याची कबूली निजामने दिली.\nPrevious articleचिंचवडमध्ये शेजाऱ्यासोबत झालेल्या भांडणानंतर व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू\nNext articleरत्नाकर मतकरी, नवनाथ गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nराज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या फ्लॅटमध्ये चोरीचा प्रयत्न\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nराष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा\nदेशात जगण्यासाठी सर्वाधिक चांगल्या शहरांच्या यादीत पुणे अव्वलस्थानी \nअटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार होणार\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमाओवाद्याकडून राजीव गांधी हत्येचा कट; नरेंद्र मोदी निशाण्यावर\nपुण्यातून लोकसभा लढवण्याचा कोणताही विचार नाही – शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/fujifilm-finepix-x10-12mp-digital-mirrorless-camera-price-pdEaUq.html", "date_download": "2018-08-18T10:21:15Z", "digest": "sha1:IXQMGR5BQ7SFCX6UVLEPBZX6THHYU7F3", "length": 16777, "nlines": 400, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फुजिफिल्म फिनेपिक्स क्स१० १२म्प डिजिटल मिररवरलेस कॅमेरा सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nफुजिफिल्म फिनेपिक्स क्स१० १२म्प डिजिटल मिररवरलेस कॅमेरा\nफुजिफिल्म फिनेपिक्स क्स१० १२म्प डिजिटल मिररवरलेस कॅमेरा\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nफुजिफिल्म फिनेपिक्स क्स१० १२म्प डिजिटल मिररवरलेस कॅमेरा\nफुजिफिल्म फिनेपिक्स क्स१० १२म्प डिजिटल मिररवरलेस कॅमेरा किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये फुजिफिल्म फिनेपिक्स क्स१० १२म्प डिजिटल मिररवरलेस कॅमेरा किंमत ## आहे.\nफुजिफिल्म फिनेपिक्स क्स१० १२म्प डिजिटल मिररवरलेस कॅमेरा नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nफुजिफिल्म फिनेपिक्स क्स१० १२म्प डिजिटल मिररवरलेस कॅमेराहोमेशोप१८ उपलब्ध आहे.\nफुजिफिल्म फिनेपिक्स क्स१० १२म्प डिजिटल मिररवरलेस कॅमेरा सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 33,999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nफुजिफिल्म फिनेपिक्स क्स१० १२म्प डिजिटल मिररवरलेस कॅमेरा दर नियमितपणे बदलते. कृपया फुजिफिल्म फिनेपिक्स क्स१० १२म्प डिजिटल मिररवरलेस कॅमेरा नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nफुजिफिल्म फिनेपिक्स क्स१० १२म्प डिजिटल मिररवरलेस कॅमेरा - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nफुजिफिल्म फिनेपिक्स क्स१० १२म्प डिजिटल मिररवरलेस कॅमेरा वैशिष्ट्य\nफोकल लेंग्थ 7.1 - 28.4 mm\nसेल्फ टाइमर 2 s / 10 s\nमॅक्सिमम शटर स्पीड 30 s\nमिनिमम शटर स्पीड 1/4000 s\nईमागे स्टॅबिलिझेर Lens-shift Type\nएक्सपोसुरे कॉम्पेनसशन TTL 256-zones\nडिस्प्ले तुपे LCD (TFT)\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 460,000 Dots\nविडिओ फॉरमॅट H.264 (MOV)\nइनबिल्ट मेमरी 26 MB (Approx.)\nफुजिफिल्म फिनेपिक्स क्स१० १२म्प डिजिटल मिररवरलेस कॅमेरा\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://diamondbookspune.com/viewdetails.php?bid=918&cat=%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2018-08-18T09:58:53Z", "digest": "sha1:EWTLWOQPRITJRKMQ44YVEWARX2DQAJ65", "length": 6635, "nlines": 73, "source_domain": "diamondbookspune.com", "title": "Welcome to Diamond Publications", "raw_content": "\nशारीरिक शिक्षण व खेळ\nBook Name : सुल्तनत-ए-खुदादाद 20 %\nAuthor : सरफराज एहमद\n\" ‘टिपू सुलतान’ कसा होता तर तो एक उत्तम प्रशासक होता. टिपूने आपल्या राज्यात जलपुनर्भरण, कृषी धोरण, धरणे, व्याजविरहित बँकींग प्रणाली, कृषीपूरक उद्योग, साखर कारखान्यांची उभारणी, आधुनिक यंत्रनिर्मिती, वैद्यकीय क्षेत्रातील सुधारणा अशी विविध धोरणे राबवली. परराष्ट्र संबंध, जहाज बांधणी या क्षेत्रांत अविस्मरणीय कामगिरी केली. इतकेच नव्हे तर, त्याने रयतेसाठी ‘आठ कलमी’ घोषणापत्र प्रसिद्ध केले होते. ‘राज्यकर्ता म्हणून शासकीय खजिन्यात अपहार केल्यास मला फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच कोणत्याही लष्करी मोहिमेवर पाठवल्यास वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार काम करेन, यात कसूर केल्यास फाशी देण्यात यावी’, असे या जाहीरनाम्यात स्पष्ट केले होते. टिपूच्या ग्रंथालयात एक हजार ८८९ इतकी पुस्तके होती. त्यातील सर्व पुस्तके केंब्रीज व ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ग्रंथालयात आजही सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. टिपूने स्वत: ४४ पुस्तकांची निर्मिती केली आहे. टिपूची ही सर्व पुस्तके देशातील विविध पुराभिलेख विभागात जपून ठेवलेली आहेत. दुर्देवाने इतिहासात क्वचितच त्याची ही बाजू समोर आली आहे. इतिहास संशोधक सरफराज अहमद यांनी या पुस्तकातून ‘खरा टिपू’ शोधून काढण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. हे पुस्तक संतुलित, न्यायपूर्ण इतिहास जगासमोर मांडून सामाजिक सौहार्द व एकात्मता सक्षम करण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य करू शकते. हे पुस्तक इतिहासप्रेमी वाचक व संशोधकांच्या निश्चितच पसंतीस पडेल याची खात्री वाटते. \"\nसमाजशास्त्र ललित अर्थशास्त्र वाणिज्य-व्यवस्थापनशास्त्र\nइतिहास व्यक्तिमत्त्व विकास चरित्रे-आत्मचरित्रे पत्रकारिता-प्रसारमाध्यमे\nराज्यशास्त्र कविता संग्रह भूगोल धार्मिक\nमानसशास्त्र मराठी साहित्य पर्यावरण ग्रंथालय-माहितीशास्त्र\nस्पर्धा परीक्षा बाल-कुमार वाङमय आपत्ती व्यवस्थापन संगीत\nआरोग्य क्रमिक पुस्तके नाटकं आयुर्वेद\nअनुवादित पुस्तके बेस्टसेलर्स विज्ञानविषयक ज्योतिष\nकथा कोशवाङमय शिक्षणशास्त्र English Literature\nकादंबरी स्त्रीविषयक शारीरिक शिक्षण व खेळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/marathi-news-marathi-websites-positive-news-aurangabad-news-70506", "date_download": "2018-08-18T11:00:26Z", "digest": "sha1:UEYFTFSHMXQF4WZQDK3CG5WHTZMXUPVA", "length": 14873, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites Positive News Aurangabad News 'त्यांनी' विद्यार्थीच नव्हे, तर गावालाही घडवले | eSakal", "raw_content": "\n'त्यांनी' विद्यार्थीच नव्हे, तर गावालाही घडवले\nमंगळवार, 5 सप्टेंबर 2017\nऔरंगाबाद : 'जल है तो कल है,' अशी हिंदीत म्हण आहे. पण, अजूनही आपल्याकडे जलसाक्षरतेकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळेच उन्हाळ्यामध्ये गावोगावी डोक्‍यावर हंडे घेतलेली बायका-मुले दिसतात. हे चित्र बदलण्याचा निश्‍चय उस्मानाबाद जिल्ह्यातील सक्करवाडी (ता. परंडा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका शिक्षक दांपत्याने केला. हे दांपत्य केवळ विद्यार्थ्यांना विद्यादानच करीत नाही; तर त्यांनी सर्व ग्रामस्थांना जलसाक्षर करून गावाला 'पाणीदार' केले आहे. अमोल अंधारे आणि विशाखा तावरे अशी त्या आदर्श शिक्षकांची नावे आहेत.\nऔरंगाबाद : 'जल है तो कल है,' अशी हिंदीत म्हण आहे. पण, अजूनही आपल्याकडे जलसाक्षरतेकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळेच उन्हाळ्यामध्ये गावोगावी डोक्‍यावर हंडे घेतलेली बायका-मुले दिसतात. हे चित्र बदलण्याचा निश्‍चय उस्मानाबाद जिल्ह्यातील सक्करवाडी (ता. परंडा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका शिक्षक दांपत्याने केला. हे दांपत्य केवळ विद्यार्थ्यांना विद्यादानच करीत नाही; तर त्यांनी सर्व ग्रामस्थांना जलसाक्षर करून गावाला 'पाणीदार' केले आहे. अमोल अंधारे आणि विशाखा तावरे अशी त्या आदर्श शिक्षकांची नावे आहेत.\n86 उंबऱ्यांचे गाव असलेल्या सक्करवाडीची लोकसंख्या अवघी 580. या ठिकाणी पहिली ते चौथीपर्यंतची जिल्हा परिषद शाळा सोडली तर इतर कुठलीही सुविधा नाही. गावात जाण्यासाठी अद्यापही धड रस्ता नाही. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे या गावात कुण्या शिक्षकाची बदली झाली तर त्याला काळ्या पाण्याची शिक्षाच समजले जाते. त्यामुळे शिक्षक या शाळेला कायम नकार देत आले. या शाळेवर जून 2016 मध्ये अंधारे आणि तावरे या शिक्षक पती-पत्नीची बदली झाली. पण, त्यांनी त्याला शिक्षा समजली नाही. उलट यातून आपल्याला समाजाची सेवा करण्याची संधीच मिळाली असा दृष्टिकोन ठेवून त्यांनी गावातील समस्या सोडवण्यासाठी हिरिरीने पुढाकार घेतला. गावातील मुख्य समस्या होती ती पाण्याची. त्यासाठी ग्रामस्थांना मैलोन्‌मैल पायपीट करावी लागत असे. हे चित्र बदलण्यासाठी या शिक्षक दांपत्याने ग्रामस्थांना केवळ जलसाक्षरच केले नाही, तर गावात लोकसहभागातून जलसंधारणाची कामे केली. त्याचेच फलित म्हणजे आज हे गाव 'पाणीदार' झाले आहे.\nया दांपत्याच्या पुढाकारातून ग्रामस्थांनी अडीच लाख रुपयांची वर्गणी जमा केली. त्यातून शाळेत ई-लर्निंग सुविधा उपलब्ध झाली. भिंतींना पेटिंग करून बोलके करण्यात आले. आता या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. मोबाईल डिजिटल स्कूल या संकल्पनेनुसार शिक्षण दिले जात आहे. यात पर्वत, किल्ल्याची माहिती विद्यार्थ्यांना देताना प्रत्यक्ष प्रोजेक्‍टरवर तो दाखविला जातो. यातून कृतीतून शिक्षण मिळण्यास मदत होते.\nटाकवे बुद्रुक - सावित्रींच्या लेकींना दुस-या टप्प्यात पंधरा सायकलींचे वाटप\nटाकवे बुद्रुक - आंदर मावळाच्या मिंडेवाडी तील ठाकरवस्ती, चावसरवस्ती, जाधववाडीतून पायपीट करीत येणा-या विद्यार्थ्यांसह सावित्रींच्या लेकींना दुस-या...\nसंयुक्त राष्ट्रांच्या माजी महासचिवांचे निधन\nसंयुक्त राष्ट्रसंघ- संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण महासभेचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन झाले आहे. 8 एप्रिल 1938 रोजी त्यांचा घाना या देशात...\n'एक धागा शौर्य' का सैनिकांसाठी जुन्नरच्या विद्यार्थ्यांनीचा अभिनव उपक्रम\nजुन्नर - सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांसाठी जुन्नरच्या शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थिनींनी 'एक धागा शौर्य'का हा अभिनव...\nसंग्रामपूर : वाण धरण ६५ टक्के भरले\nसंग्रामपूर : सातपुडा पर्वतामधील तीन जिल्ह्यांसाठी जलसंजीवनी ठरलेले वाण धरण 65 टक्के भरले आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या ...\nबारामती - विद्या प्रतिष्ठानच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पुरस्कार\nबारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/04/06/%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%9F%E0%A5%81-%E0%A4%97%E0%A5%8B/", "date_download": "2018-08-18T10:52:37Z", "digest": "sha1:SNFGKAOBGJORAO33HRPJ5E5RPZP7Q7ST", "length": 11924, "nlines": 276, "source_domain": "kayvatelte.com", "title": "१५०००….स्टिल लॉंग वे टु गो.. | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nशाहरुख खान व्हर्सेस गावस्कर →\n१५०००….स्टिल लॉंग वे टु गो..\nही आजवर या ब्लॉगला भेट दिलेल्या लोकांची संख्या.\nमला वेळोवेळी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देऊन माझा लिहिण्याचा उत्साह वाढवला .मी आजवर जे काही वेडं वाकडं लिहिलं ते वाचून तुम्ही अभिप्राय दिलेत, त्याबद्दल बद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार…\nआजवरचे स्टॅटॅस्टिक ह्या प्रमाणे:-\nटोटल पोस्ट – १०५\nशाहरुख खान व्हर्सेस गावस्कर →\n13 Responses to १५०००….स्टिल लॉंग वे टु गो..\nअभिनंदन…तुम्ही असेच लिहित रहा आणि आम्हाला नवे नवे सदर वाचायची मेजवानी देत रहा…..\nही आजवर या ब्लॉगला भेट दिलेल्या लोकांची संख्या\n… या हिशोबाने रोजचे अंदाजे १५० – २०० + विजिटर्स झाले म्हणायचे… अहो, चांगल्या-चांगल्या ब्लौग्जना मिळत नाही असं विजिटर काऊंट\n आपल्या यशाचे खरे सूत्र म्हणजे आपली सहजसोपी आणि सामान्यांना आवडणारी भाषा भाषेला कुठलीही साहित्यिक आडकाठी ठेवली नाहीत हे फार चांगले झाले. आणि कोणताही विषय आपण तितक्याच पोटतिडकीने मांडत असल्यामुळे ब्लॉग वाचकांच्या पसंतीला उतरला आहे. पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा \n तुमचा ब्लॉग इंटरेस्टिंग असतो पुढच्या प्रत्येक अंकाची वाट पाहतो आहे.\nअभिनंदन. आपली ओघवती भाषा आणी अनालंकारिक भाषाशैली कदाचित यास कारणीभूत असावी.\nरात्री टिव्ही वर ते बालिका बधु सुरु झालं की मी लिहितो.. माझ्या लिहिण्याचं सगळं श्रेय त्या टीव्ही ला आणि मला न आवडणाऱ्या सिरियल्सला..\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nसिक्रेट मेसेज कसा पाठवायचा\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://sahajach.com/itar_goshti/computer_care.html", "date_download": "2018-08-18T10:11:34Z", "digest": "sha1:FILVIELWYATKMQWEFR2NYWFB2WU7EN2Y", "length": 3760, "nlines": 14, "source_domain": "sahajach.com", "title": "Sahajach.com", "raw_content": "आपल्या मित्र-मैत्रीणींना तसेच इतरांना सहजच.कॉमबद्दल कळविण्यासाठी\nइथे खरंच कुणाची मदत करायची\nतुमच्या लॅपटॉपची अथवा कॉम्प्युटरची काळजी कशी घ्याल\n१. आपण ज्या ठिकाणी लॅपटॉप अथवा कॉम्प्युटरवर काम करता ती जागा शक्यतो स्वच्छ असावी.\n२. शक्यतो थंडगार वातावरणामध्ये काम करावे - लॅपटॉपवर एखाद्या मोठ्या सॉफ्टवेअरवर काम करताना लॅपटॉपची जास्त शक्ती वापरली जाऊन तो पटकन गरम होतो. म्हणून शक्यतो लॅपटॉपवर थंडगार वातावरणामध्ये काम करावे. तसेच लॅपटॉपच्या मागच्या बाजूस असलेल्या फॅनची जागा मोकळी असावी, जेणेकरून आतील गरम हवा व्यवस्थित बाहेर जाईल.\n३. लॅपटॉपच्या स्क्रीनची काळजी घ्यावी - लॅपटॉपची स्क्रीन एल.सी.डी ( LCD - Liquid Crystal Display ) ची असल्याने ती फारच नाजुक असते. शक्यतो तिला हात अथवा बोट लावणे टाळावे. लॅपटॉपची स्क्रीन साफ करताना देखिल योग्य त्याच क्लिनिंगच्या साधनांनीच साफ करावी.\n४. लॅपटॉपची बाळगताना - लॅपटॉप नेहमी व्यवस्थित हाताळावा. वजनाने हलका असल्याने तो कसाही हाताळू नये. तसेच एखाद्या ठिकाणी त्याला ठेवताना हळूवारपणे ठेवावे. प्रवासामध्ये त्याला जास्त धक्का लागणार नाही व जास्त हालणार नाही अशाच ठिकाणी ठेवावा.\n५. लॅपटॉपजवळ पेय पिणे टाळावे - लॅपटॉपवर काम करताना शक्यतो कुठलेही पेय पिणे टाळावे. कारण चुकून त्याचा एखादा थेंब लॅपटॉपच्या कि-पॅडवर पडल्यास प्रॉब्लेम होवू शकतो.\n६. धुरळा झटकावा - लॅपटॉपच्या स्क्रीनवर तसेच कि-पॅडवर धुरळा बसू देऊ नये. बर्‍याच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू फक्त धुरळ्यामुळे बिघडतात.\nसुचना - सहजच.कॉम वरील माहिती संबंधी\nसहजच.कॉम वरील सर्व हक्क राखिव आहेत. - अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-18T11:00:05Z", "digest": "sha1:R7KPMQT4KYNVKVH2EDOQWOUVYKSDOEPK", "length": 16398, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "संभाजी भिडे यांना न्यायालयात हजार राहण्याची नोटीस - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे…\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची…\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Maharashtra संभाजी भिडे यांना न्यायालयात हजार राहण्याची नोटीस\nसंभाजी भिडे यांना न्यायालयात हजार राहण्याची नोटीस\nमुंबई, दि. ११ (पीसीबी) – ‘आपल्या शेतातील आंबे खाणाऱ्या १५० जणांना मुले झाली, ज्यांना मुलगा हवा, त्यांना मुलगाच होईल’ असे विधान करत गर्भधारणापूर्व प्रसवपूर्व निदान तंत्र कायद्याचा भंग केल्याच्या प्रकरणात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांना ३१ ऑगस्ट रोजी येथील न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली जाणार आहे.\nपीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने न्यायालयात भिडे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. महापालिकेच्यावतीने न्यायालयात कायद्याचे उल्लंघन झाल्याचा मुद्दा मांडण्यात आला. सुनावणी दरम्यान न्यायालयाने भिडे यांना ३१ ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश दिल्याचे वैद्यकीय अधिक्षक जे. झेड. कोठारी यांनी एका वृत्त्वाहिनीला सांगितले.\nदहा जून रोजी भिडे यांनी नाशिक येथे आयोजित सभेत वादग्रस्त विधान केले होते. या संदर्भात तक्रार झाल्यानंतर महापालिकेने त्यांना नोटीस बजावली होती. परंतु ती परत आली. दरम्यानच्या काळात जिल्हास्तरीय पीसीपीएनटीडी समितीने भिडेंच्या विधानाची पडताळणी केली. कायद्यानुसार गर्भलिंग निदानाबाबत कोणताही दावा करता येत नाही. त्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत समितीने भिडे यांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करण्याचे निर्देश दिले होते.\nPrevious articleआंदोलक हिंसक होणे अत्यंत गंभीर; मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार – सर्वोच्च न्यायालय\nNext articleसंभाजी भिडे यांना न्यायालयात हजार राहण्याची नोटीस\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घाेषणा\nहिम्मत होती तर एकेकाने यायचे होते मग दाखवले असते; औरंगाबादेतील एमआयएम नगरसेवकाचा माज\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यात दोन दिवसात ४८८ मद्‌यपी वाहन चालकांवर पोलिसांची कारवाई; न्यायालयात खटले...\nदेशात जगण्यासाठी सर्वाधिक चांगल्या शहरांच्या यादीत पुणे अव्वलस्थानी \nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा...\nवाजपेयींच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनाला दिग्गजांची रीघ; फडणवीस यांच्याकडून पार्थिवाचे अत्यंदर्शन\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची नदीत उडी\nमुलुंडमध्ये औषध व्यवसाय परिषदेच्या कार्यालयाबाहेर चेंगराचेंगरी; ४ जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.penana.com/story/14958/%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%A3-%E0%A4%AE/issue/0", "date_download": "2018-08-18T10:14:02Z", "digest": "sha1:V5ZC3U2XKMUQHLNEHGOORDR256EL6UYP", "length": 3710, "nlines": 89, "source_domain": "www.penana.com", "title": " परिणाम | Penana", "raw_content": "\nडोंगराळ भागातील गावाजवळ एका उल्कापातानंतर एक लहान गावातील एक मुलगा आणि त्याची मैत्रीण ह्या घटनेचे साक्षीदार बनतात. क्रॅश साईटचे अन्वेषण करण्यासाठी ते दोघे टेकडीजवळ जातात. 119Please respect copyright.PENANAzLKmsDQ4eK\nत्यांना क्रॅश साईट वर एक निराळे लॉकेट आढळले. त्या वस्तू ला स्पर्श केल्यानंतर जॅकला काही शक्ती मिळतात. पण असे केल्याने तो पृथ्वीवर अनागोंदी चे वातावरण निर्माण करतो.119Please respect copyright.PENANALi8tgoTmHV\nत्या उल्केबरोबर जे काही आले ते भयानक आणि ताकदवर होते. 119Please respect copyright.PENANAuBxv619ORP\nह्या दोघांच्या नकळत देव आणि दैत्यांमध्ये तिसरे महायुद्ध सुरु झाले होते. अनेक आकाशगंगांमध्ये हे युद्ध मोठ्या जोरात छेडले गेले होते.119Please respect copyright.PENANAoTIxmYVglC\nलवकरच संपूर्ण पृथ्वी चांगले आणि वाईट यांच्यातील युद्धामध्ये खेचली जाईल. हा जगाचा अंत आहे का\nजॅक आणि त्याचे मितर-परिवार हा परिणाम आणि जगाचा अंत सहन करू शकतील का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.tarunbharat.com/news/457681", "date_download": "2018-08-18T10:25:44Z", "digest": "sha1:PEMTZM66Y42JYVSDAVNHBTHCLM3AFL3I", "length": 10223, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मानवकेंद्रीत राष्ट्रवादाची उभारणी आवश्यक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मानवकेंद्रीत राष्ट्रवादाची उभारणी आवश्यक\nमानवकेंद्रीत राष्ट्रवादाची उभारणी आवश्यक\nजागतिकीकरणाच्या प्रक्रियेत समूह केंद्रीत भांडवलशाही गतीने पुढे जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता कोंडीत सापडली आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या या धोरणामुळे पुन्हा एकदा भांडवलदारांचा वर्चस्ववाद वाढण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर मानव केंद्रीत राष्ट्रवादाची नव्याने उभारणी करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मार्क्सवादी नेते, राजकीय विश्लेषक डॉ. भालचंद्र कानगो यांनी केले.\nमराठी भाषा विभाग, राज्यशास्त्र विभाग व श्रमिक प्रतिष्ठानतर्फे कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी आयोजित परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठात गुरुवारी कार्यक्रम झाला. ‘जागतिकीकरणाचे बदलते स्वरूप आणि आपण’ या विषयावरील परिसंवादात कानगो यांनी ‘आंतरराष्ट्रीय अर्थ : राजकारणाचे बदलते स्वरूप’ यावर मते मांडली. प्रा. संजीव चांदोरकर, रघुनाथ ढमाले, सुधाकर मानकर, प्रकाश पवार, डॉ. मेघा पानसरे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nडॉ. कानगो म्हणाले, समता हे भारतीय श्रेष्ठत्व समजले जाते. प्रत्यक्षात मात्र वर्चस्ववादाचे श्रेष्ठत्व वाढत आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या शेतकऱयांच्या हिताऐवजी व्यापाऱयांचे हित पाहत आहेत. शेतकऱयांच्या जमिनीचे बाजारीकरण करून शेतकऱयांना बेदखल करण्याचे वेगवान प्रयत्न राज्यकर्त्यांकडून जगभर सुरू आहेत. त्यापासून बचाव करण्यासाठी मानवकेंद्रीत राष्ट्रवादाची उभारणी गरजेची आहे. ते म्हणाले, नवभांडवलशाहीची खाबुगिरी, तंत्रज्ञानातील वाढते बदल याला पर्याय म्हणून पंडित नेहरूंच्या काळातला सर्वसमावेशक राष्ट्रवाद आज आवश्यक आहे. कार्पोरेट जगात आणिबाणीचे स्वरूप बदलत असले, तरी सर्वसामान्यांसाठी ते जीवघेणे बनले आहे. संपत्ती, सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे मानवी विकासाला मर्यादा येत आहेत. सत्तेशिवाय विकास ही संकल्पना फसवी आहे. समाजकारणाबरोबर राजकारण केलेच पाहिजे. सध्या राजकारणाचे विकृतीकरण करून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी राजकारणापासून दूर न राहता राजकारणाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे.\nमॉडेलाईज ऍग्रीकल्चर संकल्पनेची गरज\nजागतिक अर्थव्यवस्थेच्या एकात्मीकरणाने नवी आव्हाने उभी केली आहेत. या गतिमान प्रक्रियेपासून माणूस मुक्त नाही. आजची गतिमान प्रक्रिया प्रत्यक्ष जगण्याच्या व्यापक संघर्षापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे भांडवलशाहीला वेळीच रोखण्यासाठी, जागतिकीकरणात बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी ‘मॉडेलाईज्ड ऍग्रीकल्चर’ ही संकल्पना भारताने स्वीकारणे गरजेचे आहे, असे डॉ. कानगो यांनी स्पष्ट केले.\n‘जागतिकीकरणातील अंतर्विरोध : धोके आणि संधी’ या विषयावर मुंबईतील प्रा. संजीव चांदोरकर म्हणाले, तीन दशकांनंतर आजची स्थिती भयावह आहे. दारिद्रय़ातून विषमता आणि अस्थैर्य स्पष्टपणे दिसत आहे. दुसऱया सत्रात ‘भारतातील नवफॅसिझमचे स्वरूप’ या विषयावर डॉ. माया परिमल यांनी मार्गदर्शन केले. ‘महाराष्ट्रातील अस्मितांचे राजकारण आणि पुरोगामी पक्षांची भावी दिशा’ या विषयावर संवादाचा समारोप झाला. यावेळी मराठी विभागप्रमुख डॉ. राजन गवस, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.\nइचलकरंजीत चावडी वाचन मोहिमेस प्रारंभ\nदेवस्थान समिती नियोजनानुसारच अंबाबाई मंदिरातील साजरा नवरात्रोत्सव\nनृसिंहवाडीचे सुप्रसिद्ध कीर्तनकार नरहरी बुवा गोखले यांना जगद्गुरु पुरस्कार जाहीर\nराजकर्त्यांनीच समाजात जातीयतेचे विष पेरलेःडॉ.श्रीपाल सबनीस\nखेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट\nगोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा\nइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात\nपंतप्रधानांकडून केरळला 500 कोटींची मदत\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018\nशासनाच्या निर्णयाला निसर्गाच्या वाकुल्या\nबिबटय़ा कातडी तस्करीत आणखी एकाचा सहभाग\nनाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213540.33/wet/CC-MAIN-20180818095337-20180818115337-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}